![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh8umoOsZQkfGdrmY_CThOJ3_zfAyQ_wWzfa0Ayg15i3EqV30EaGXVR3OKHF95CBOLs1I8L_cLPosqIE8WxOFdPraut0o06GO2HkotyqiSH6FWJVou1Q3G2y_REMm0sU4XXef0DNA/s400/blogspotsmylies.jpg)
बहुतेक नाटक सिनेमांमध्ये असे दाखवतात की त्यातली माणसे योगायोगाने भेटतात, कधी कधी योगायोगानेच ती नेमकी घटनास्थळी जाऊन पोचतात किंवा ठरवूनसुध्दा पोचू शकत नाहीत. त्यामुळे अनपेक्षित घटना घडतात आणि त्यातून कथानकाला कलाटणी मिळून ते रोचक आणि मनोरंजक होत जाते. प्रत्यक्ष जीवनात घडून येणा-या योगायोगांचे प्रमाण त्या मानाने कमीच असते. कांही गोष्टीतल्या एकाद्या पात्राचे नशीब एवढे बलवत्तर असते की ते पात्र मरणाच्या दारात, अगदी कोमात जाऊन निपचीत पडलेले असतांनासुध्दा कांही महिने किंवा वर्षे उलटल्यावर अचानकपणे ठणठणीत बरे होते आणि पटकन उभे राहून दुप्पट जोमाने ढिशुम् ढिशुम् करू लागते. प्रत्यक्षात असे क्वचितच घडत असेल. कांही कथानकातली पात्रे पुनर्जन्म घेऊन पुन्हा गोष्टीत प्रवेश करतात आणि त्यातला नेमका आपला धागा पकडतात. हल्ली चाललेल्या एका लोकप्रिय मालिकेत तर त्यातल्या भूतकाळातली पांच सहा
पात्रे पुनर्जन्म घेऊन वर्तमानकाळात आली आहेत एवढेच नव्हे तर त्यांच्या पूर्वीच्या जन्मातले आत्मे आपापले वेगळे अस्तित्व बाळगून आहेत आणि अधून मधून ते पीरियड कॉस्च्यूम परिधान करून वर्तमानात डोकावायला येतात असे दाखवले आहे. हे सगळे आपल्याला असंभव वाटते. माणसाच्या बाबतीत असे असले तरी या ब्लॉगने मात्र आतापर्यंतच्या आपल्या तीन वर्षांच्या अल्प आयुष्यात योगायोग, पुनरुज्जीवन आणि पुनर्जन्म या तीन्ही गोष्टींचा अनुभव घेतला आहे.
पात्रे पुनर्जन्म घेऊन वर्तमानकाळात आली आहेत एवढेच नव्हे तर त्यांच्या पूर्वीच्या जन्मातले आत्मे आपापले वेगळे अस्तित्व बाळगून आहेत आणि अधून मधून ते पीरियड कॉस्च्यूम परिधान करून वर्तमानात डोकावायला येतात असे दाखवले आहे. हे सगळे आपल्याला असंभव वाटते. माणसाच्या बाबतीत असे असले तरी या ब्लॉगने मात्र आतापर्यंतच्या आपल्या तीन वर्षांच्या अल्प आयुष्यात योगायोग, पुनरुज्जीवन आणि पुनर्जन्म या तीन्ही गोष्टींचा अनुभव घेतला आहे.
या ब्लॉगचा जन्मच मुळी एका योगायोगातून झाला. सन २००५ च्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस 'ब्लॉग' आणि 'युनिकोड' हे दोन नवे शब्द योगायोगाने माझ्या कानावर किंवा नजरेला पडले. त्यांच्याबद्दल कुतूहल वाटल्यामुळे त्यांची थोडी माहिती काढली आणि एकाद्या लहान मुलाच्या हातात एकदम दोन खेळणी मिळाली तर तो जसे चाळे करेल तशा प्रकारे त्यांच्याबरोबर खेळता खेळता त्यातून हा ब्लॉग तयार झाला आणि अपलोड पण झाला. लिपी किंवा आकृती यासारख्या सॉफ्टवेअरच्या मदतीशिवाय मराठीत चार शब्द लिहिणे आणि ईमेलखेरीज दुसरे कांहीही आणि तेसुध्दा देवनागरी लिपीमधील अक्षरांतून इंटरनेटवर पाठवणे, आपली वेबसाईट नसतांना आपली स्वतःची छोटीशी जागा नेटवर बनवून त्या जागेवर आपल्याला हवा तो मजकूर नेऊन तिथे तो साठवून ठेवणे अशा अनेक गोष्टी या एका प्रयोगातून साधल्या गेल्या होत्या. संगणक आणि आंतर्जाल यांबद्दल फारशी माहिती नसतांना मला हे जमले हासुध्दा कदाचित एक योगायोगच असेल. ही धडपड चालली असतांना सारखे मला दाट धुक्यात एकादी टेकडी चढत असल्यासारखे वाटत होते. जेंव्हा माझ्या या ब्लॉगचा पहिला भाग प्रसिध्द झाला आणि तो पुन्हा उघडून वाचला तेंव्हा मला त्या डोंगराच्या माथ्यावर पोचल्याचा आनंद पण मिळाला.
हे सगळे एकदाचे झाल्यानंतर त्यामागची उत्सुकता आणि नव्याची नवलाई तिथेच संपली. डोंगरावर चढलेला माणूस कांही तिथेच बसून रहात नाही. घरी माघारी गेल्यानंतर पुन्हा पुन्हा तोच डोंगर चढण्यासाठी वेगळी कारणे लागतात. त्याचप्रमाणे हा ब्लॉग तयार झाल्यानंतर तिथे काय लिहायचे, कशासाठी आणि कुणासाठी ते लिहायचे वगैरे प्रश्न समोर उभे राहिले. त्यांची उत्तरे शोधणे अजून चालले आहे. या शोधाशोधीमध्येच मी आपल्या कांही मित्रांना हा ब्लॉग वाचून पहायला सांगितले. त्या सगळ्या लोकांचे काँप्यूटर युनिकोडच्या बाबतीत निरक्षर निघाले. त्यांना त्यातली फक्त चित्रे तेवढी पहायला मिळतात आणि त्यांच्या खाली छोट्या छोट्या चौकोनांच्या रांगा दिसतात असे समजले. त्यामुळे हा ब्लॉग चित्रमय रूपात बनवायचे ठरवले आणि त्या दृष्टीने नवे प्रयोग सुरू केले.
आधी युनिकोड वापरून नोटपॅडमध्ये मजकूर लिहिला आणि पेंटमध्ये तो चिकटवून ते एक चित्र आहे असे काँप्यूटरला सांगून त्याची दिशाभूल केली. पण ते चित्र ब्लॉगवर चढवल्यावर खूप लहान झाले आणि त्यातल्या अक्षरांचे तुकडे पडून ते एक शिलालेखाचे चित्र वाटायला लागले. म्हणजे पुन्हा ते वाचणे अशक्यच. त्या लेखाचे चार भाग करून आणि मोठा फाँट वापरून बेताच्या आकाराची चार चित्रे बनवून पाहिली. ती ब्लॉगवर चढवल्यानंतर वाचता येत होती पण पहिला परिच्छेद शेवटी आणि चौथा परिच्छेद सुरुवातीला आल्याने त्या लेखाचा पार चुथडा झाला. ती चित्रे उलट क्रमानेच अपलोड करणे आवश्यक होते, पण एक दोन चित्रे चढवल्यावर लिंक तुटून जायची आणि त्या लेखाची सुरुवातच मागे रहायची. मग तो ब्लॉग पुन्हा पुन्हा उघडून त्यात ती चित्रे चढवावी लागत. हे सगळे काम किचकट आणि कंटाळवाणे तर होतेच, शिवाय निराशाग्रस्त करणारे असल्यामुळे ते माझ्या सहनशक्तीचा अंत पहात होते.
त्या काळात मराठी ब्लॉगविश्वाचा पत्ता लागला आणि त्यात भ्रमण करतांना युनिकोडमध्ये लिहिलेले कांही सुरेख ब्लॉग वाचायला मिळाले. माझ्या ओळखीच्या लोकांकडे युनिकोडसाक्षर संगणक नसला तरी असंख्य अनोळखी लोकांकडे ते आहेत आणि त्यांची संख्या वाढतच जाणार आहे याचा विचार करून पुन्हा युनिकोडकडे वळावेसे वाटले. त्याच सुमारास एका योगायोगाने याहू ३६० वर येण्याचे आमंत्रण मिळाले आणि युनिकोडमध्ये दुसरा ब्लॉग सुरू करून दिला. त्यानंतर जसे सुचेल, जमेल तसे लिहून लगेच त्या ब्लॉगवर टाकायचे आणि सवडीनुसार त्याचे चित्रमय रूपांतर करून या ब्लॉगवर ते चढवायचे असे करू लागलो. त्यामुळे अगदी सुरुवातीचे कांही भाग सोडून नंतरचे सारे भाग हे त्यांचे पुनर्जन्मच आहेत. या प्रक्रियेला लागणारा विलंब आणि त्यातल्या वाढत चाललेल्या तांत्रिक अडचणी यांमुळे ते काम संथगतीनेच होत होते. या ब्लॉगच्या मागाहून सुरू झालेल्या याहू ३६० वरील भागांची संख्या सन २००६ मध्ये सव्वाशेच्या वर गेली, पण त्यातले फक्त पंच्याहत्तर भागच या स्थळावर येऊ शकले.
हळूहळू कां होईना पण कसाबसा चालत असलेला हा ब्लॉग सन २००७ मध्ये जेमतेम पांच भाग झाल्यावर बंदच पडला. माझी किल्ली लावून तो उघडणे मलाच अशक्य होऊन बसले. विनामूल्य मिळत असलेल्या या सेवेत बाधा आली तर त्याची तक्रार तरी कुठे आणि कशी करणार? त्या सुमारास ब्लॉगस्पॉटचे हस्तांतरण झाले होते. त्यामुळे नव्या व्यवस्थापनेने फुकट्या लोकांची खाती बंद केली असावीत असे वाटले. सन २००७ संपून २००८ उजाडल्यावर या ब्लॉगची आठवण झाल्याशिवाय कसे राहील? दोन वर्षांपूर्वी या ब्लॉगद्वारे मराठी ब्लॉगविश्वात प्रवेश करतांना त्यानेच मला आनंदाचे दोन चार क्षण मिळवून दिले होते. पुन्हा प्रयत्न करून नवी किल्ली मिळवली आणि पहिल्याच प्रयत्नात त्याचे किवाड उघडले. आंतला खजिना किंवा अडगळ जे कांही असेल ते शाबूत असलेले पाहून हायसे वाटले.
पण आता पुढे त्याचे काय करायचे हा देखील एक प्रश्नच होता. लेखनाचे चित्रात रूपांतर करण्याची संवय मोडली होती आणि आता त्याची एवढी गरज उरली नव्हती. फक्त चित्रेच दाखवण्याएवढी गती मला चित्रकलेत किंवा छायाचित्रणात कधीच नव्हती. सर्व सुखसोयी असलेल्या फ्लॅटमध्ये रहायला गेल्यानंतरही जुन्या झोपड्याबद्दल आपुलकी वाटत असली तरी तिथे कोणी आपला मुक्काम हलवत नाही. फार तर तिचे हॉलिडे होममध्ये रूपांतर करण्याचा विचार करतो. तोच विचार माझ्याही मनात होता, पण पुढील दोन तीन महिन्यात परिस्थितीने पुन्हा कलाटणी घेतली आणि याहू ३६० वर प्रश्नचिन्ह उभे राहिले. त्यामुळे तिकडले सामान या ब्लॉगवर हलवायचे ठरवले. पण यात एक प्रॉब्लेम होता.
आजचे वर्तमान उद्याची रद्दी असते असा एक प्रसिध्द (सु)विचार आहे. हे वचन ब्लॉग्जनासुध्दा लागू पडते. त्यात तीन वर्षांपूर्वी शंभराच्या आंत असलेली ब्लॉगकरांची संख्या वाढून हजारावर गेली होती. त्यातली बहुतेक मंडळी सळसळत्या रक्ताची होती. त्यांच्या ताज्या दमाच्या लेखनाच्या महापुरात माझ्या जुन्या लेखांकडे कोणाचे लक्ष कितपत जाईल अशी शंका मनात होती. तरीही थोडी जुनी पाने चाळून पाहिली. त्यात अजून थोडा दम आहे असे मला वाटले. त्यांच्यावरची धूळ झटकून थोडेसे पॉलिश करण्याइतपत दुरुस्ती आणि सुधारणा करून या ब्लॉगवर ते लेख चढवून पाहिले. माझी समजूत कितपत बरोबर आहे हे पाहण्यासाठी भेट देणा-या लोकांची मोजदाद करणारे यंत्र बसवले. त्याचा आकडा पुढे सरकतांना पाहून धीर आला आणि ते काम पुढे चालू ठेवले. यामुळे २००८ साली संपूर्ण वर्षात दुस-या जागी १६० भाग झाले तर या ब्लॉगचे नऊ महिन्यातच अडीचशे होऊन गेले आहेत.
आता २००९ वर्ष येत आहे. पण मागील तीन वर्षांचा अनुभव पाहिला तर पुढच्या वर्षी काय होणार आहे याची पुसटशी कल्पना देखील त्यातल्या कुठल्याच आदल्या वर्षाच्या अखेरीस आली नव्हती. त्यामुळे काय होणार आहे याचा विचार करण्यापेक्षा आपण काय करू शकतो ते पाहणे अधिक महत्वाचे आहे. जुन्या मालाचा साठा आता लवकरच संपून जाईल. त्यानंतर कोणती नवी निर्मिती करावी याबद्दल कांही कल्पना माझ्या मनात आहेत. वाचकांनी आपल्या कल्पना, सूचना, अभिप्राय, टीका वगैरे प्रतिसादातून द्यावेत अशी नम्र विनंती आहे. या वर्षी त्यांनी दिलेल्या आधारासाठी मी त्यांचा आभारी आहे. नव्या वर्षात सर्वांना सुखसंपत्ती, आयुरारोग्य यांचा बरपूर लाभ होवो अशा हार्दिक शुभेच्छा.