Wednesday, October 30, 2013

अणू, रेणू आणि देवाचा कण - भाग २



गेल्या तीन चार शतकांमध्ये युरोपात विज्ञानयुग अवतरले आणि अनेक शास्त्रज्ञांनी निरनिराळ्या दिशांनी वैज्ञानिक पद्धतीने संशोधन सुरू केले. निरनिराळी मूलद्रव्ये (Elements) आणि त्यांची संयुगे (Compounds) यांची रासायनिक सूत्रे (Chemical Formulae) मांडली गेली. दोन मूलद्रव्यांच्या (Elements) संयोगातून (Reaction)  प्रयोगशाळांमध्ये त्यांची संयुगे (Compounds) तयार केली आणि त्या संयुगांचे विद्युतशक्तीने पृथःकरण (Electrolysis) करून त्यातली मूलद्रव्ये वेगळी काढून दाखवली आणि त्यांची समीकरणे सप्रयोग सिद्ध केली गेली. हे करतांना मूलद्रव्याचा (Elements) सर्वात लहान कण हा Atom, आणि संयुगाचा (Compounds) सर्वात लहान कण हा molecule या त्या शब्दांच्या शास्त्रीय व्याख्या रूढ झाल्या. कुठल्याही पदार्थाचा या दोघांपेक्षा लहान कण अस्तित्वात नसतो असेच पुढील दोन तीन शतकेपर्यंत समजले जात होते.

या जगात असंख्य प्रकारचे नैसर्गिक रासायनिक पदार्थ आहेत. त्यांचेसंबंधी संशोधन करत असतांना त्यांचे पृथःकरण करून त्यांच्यामध्ये असलेले घटक वेगवेगळे केले गेले किंवा त्यांची ओळख पटवून घेतली गेली. ते पहात असतांना एक आश्चर्यजनक गोष्ट आढळून आली. नैट्रोजन, ऑक्सीजन, हैड्रोजन, क्लोरिन यासारखे प्रमुख वायू, लोह, तांबे, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, पोटॅशियम, पारा (मर्क्यूरी) यासारखे मुख्य धातू आणि कार्बन, सिलिकॉन, सल्फर, फॉस्फोरस यांसारखे काही अधातू अशा निवडक मूलद्रव्यांपैकीच काही एलेमेंट्स जगातल्या बहुतेक सगळ्या पदार्थांमध्ये मुख्यतः असतात असे दिसले. अधिक संशोधनानंतर हीलियम, आर्गॉन, रेडियम, युरेनियम वगैरे आणखी काही मूलद्रव्ये मिळाली, पण एवढी प्रचंड विविधता असलेल्या पृथ्वीवरील निसर्गात सर्व मिळून फक्त ९२ च मूलद्रव्ये आहेत हे प्रयोग आणि चिंतन यामधून नक्की ठरले. गेल्या शंभर वर्षांमध्ये त्यात आणखी सुमारे वीस मानवनिर्मित मूलद्रव्यांची भर आता पडली आहे. पण त्यांचे प्रमाण इतके कमी आहे की त्यांचे अस्तित्व फक्त नावापुरतेच आहे. याचा अर्थ हे संपूर्ण जग फक्त सुमारे शंभर प्रकारच्या मूलद्रव्यांच्या अणूंपासून बनलेले आहे. त्यातलीही निम्म्याहून जास्त मूलद्रव्ये अत्यंत दुर्मिळ (रेअर अर्थ्स) अशी आहेत. त्यांचा प्रत्यक्षात फारसा उपयोग केला जात नाही. फक्त चाळीस पन्नास प्रकारच्या अणूंपासून जवळ जवळ सगळे जग निर्माण झाले आहे असे म्हणता येईल.

या उपयोगी मूलद्रव्यांचे गुणधर्म प्रयोगशाळांमध्ये बारकाईने तपासून पाहतांना त्यातून निसर्गाचे विशिष्ट नियम समजत गेले. या चाळीस पन्नासामधलीसुध्दा सगळीच मूलद्रव्ये इतर सगळ्याच मूलद्रव्यांशी संयोग पावत नाहीत. उदाहरणार्थ लोह आणि सोने यांचे संयुग बनत नाही. दागीने बनवण्यासाठी सोन्यामध्ये तांबे मिसळले जाते पण ते फक्त मिश्रण असते. या दोन धातूंमध्ये रासायनिक प्रक्रिया (Chemical Reaction) होत नाही. जी मूलद्रव्ये संयोग पावतात ती विशिष्ट प्रमाणातच एकमेकांशी जुळतात. दोन भाग हायड्रोजन आणि एक भाग ऑक्सीजन मिळून पाणी तयार होते. जगातल्या कुठल्याही समुद्रातले, नदीतले किंवा डबक्यातले पाणी घेऊन तपासून पाहिले तर त्यात हेच प्रमाण दिसते. दोन भाग हायड्रोजन आणि दहा भाग ऑक्सीजन यांना जरी एकत्र ठेऊन त्यात ठिणगी पाडली तरी त्यातल्या फक्त एक भाग ऑक्सीजनचा उपयोग होईल आणि ९ भाग ऑक्सीजन शिल्लक राहील. त्याच प्रमाणे दहा भाग हायड्रोजन आणि एक भाग ऑक्सीजन एकत्र ठेऊन त्यात ठिणगी पाडली तरी फक्त दोन भाग हायड्रोजनचा उपयोग पाणी निर्माण करण्यात होईल आणि ८ भाग हायड्रोजन तसाच शिल्लक राहील. ठिणगी पडली नाही तर हायड्रोजन आणि ऑक्सीजन वायूंचे ज्वालाग्राही मिश्रण तयार होईल. नैट्रोजन, ऑक्सीजन, हैड्रोजन, क्लोरिन वगैरे वायूंचे अणू एकटे रहातच नाहीत. जेंव्हा त्यांचा दुस-या एकाद्या मूलद्रव्याच्या अणूंशी संयोग होत नाही तेंव्हा ते आपल्याच भावाशी जोडून घेऊन जोडप्याने एकत्र राहतात. या वायूंच्या प्रत्येक molecule मध्ये दोन दोन Atom असतात. यासारख्या अनेक गोष्टी या संशोधनांमधून समोर आल्या. हे असे का होत असावे याचा विचार केला गेला.

दोन, तीन किंवा अधिक मूलद्रव्यांपासून संयुग तयार होते तेंव्हा त्या मूलद्रव्यांचे अणू (Atom) एकमेकांना बांधून घेतात किंवा एकमेकांमध्ये अडकतात आणि त्यातून त्या संयुगाचा रेणू (molecule ) तयार होतो. त्या पदार्थाचे सगळे गुणधर्म या रेणूमध्ये असतात, रेणू हा त्याचा सर्वात सूक्ष्म असा कण असतो. त्याच्या अंतरंगात निरनिराळे अणू (Atom) असतात, पण ते सुटे नसतात रासायनिक (Chemical) बंधनात ते जखडले गेलेले असतात. संयुग बनल्यानंतर मूलद्रव्यांचे गुणधर्म शिल्लक रहात नाहीत. हायड्रोजन आणि ऑक्सीजन यांचे कुठलेच गुणधर्म पाण्यामध्ये नसतात, पाण्याचे गुण सर्वस्वी भिन्न असतात. भिन्न अणूंचे मिळून संयुग होत असतांना  त्यांच्यात हे बंध कां, कसे आणि केंव्हा तयार होऊ शकतील याची तात्विक चिकित्सा अणूंच्या मॉडेल्सवरून केली जाते. प्रत्येक मूलद्रव्यांचे अणू ठराविक प्रमाणातच दुस-या मूलद्रव्यांचे अणूंशी जुळतात याचे कारण त्या अणूंच्या अंतर्गत रचनेमध्ये असणार, हे विचार प्रबळ झाले. यावरून अणूच्या अंतर्गत रचनेची मॉडेल्स तयार केली गेली. अशी काही मॉडेल्स चित्रामध्ये दाखवली आहेत.

मुळात अणू हाच इतका सूक्ष्म कण असतो की कुठल्याही प्रकारच्या सूक्ष्मदर्शक यंत्रानेसुद्धा अख्ख्या अणूचे दर्शन घेणे देखील केवळ अशक्य आहे. त्याच्या अंतरंगात डोकावून पाहण्याचा प्रश्नच येत नाही. यामुळे अणू या मूल कणाची रचना कशी असावी यावर फक्त तात्विक विवेचन करणे शक्य आहे. पण ही रचना अशा अशा प्रकारची असल्यास त्यामुळे त्या अणूचे गुणधर्म असे असे होतील आणि तो पदार्थ अशा अशा प्रकारे वागेल असे तर्कानेच ठरवता येते.  या कामात निरनिराळ्या मॉडेल्सचा उपयोग केला जातो. प्रत्यक्षामध्ये अणूचे बाह्य किंवा अंतरंग असेच असेल किंवा वेगळेच असेल, हे कोणीच पुराव्यानिशी सांगू शकणार नाही. पण अभ्यास करण्यासाठी ते असे असे आहे असे गृहीत धरून त्याची समीकरणे मांडली जातात आणि प्रयोगावरून ती सिद्ध झाली तर तेवढ्यापुरते तरी ते मॉडेल बरोबर आहे असे मानले जाते.

 

या सगळ्या मॉडेल्समध्ये असे दाखवले आहे की अणूंच्या मध्यभागी एक अणूगर्भ (न्यूक्लियस) असतो. त्यात धनविद्युतभार असलेले प्रोटॉन्स नावाचे आणि कुठलाही विद्युतभार नसलेले न्यूट्रॉन्स नावाचे कण असतात. अणूचे बहुतेक सगळे वस्तुमान या दोन प्रकारच्या कणांमध्येच असते. इलेक्ट्रॉन्स नावाचे ऋण विद्युतभार असलेले अतीसूक्ष्म कण या न्यूक्लियसच्या सभोवती घिरट्या घालत असतात. प्रत्येक अणूमधील प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स यांची संख्या नेहमी समसमान असते. त्यामुळे या दोघांनी मिळून बनलेला अणू न्यूट्रल म्हणजे विद्युतभारहीन असतो. या प्रकारच्या रचनांमधून हे स्पष्ट होते की अणू हा सर्वात सूक्ष्म कण राहिला नाही. त्याचा भाग असलेले प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे कण अणूपेक्षा खूपच छोटे असतात, विशेषतः इलेक्ट्रॉन्स तर अगदीच सूक्ष्म असतात.

 . . . .  . . . . . . . . . . .  . . (क्रमशः)

Tuesday, October 29, 2013

अणू, रेणू आणि देवाचा कण - भाग १

मातीचे ढेकूळ नुसते हाताने चुरगाळले तरी त्याचा भुगा होतो, मातीच्या मानाने दगड बराच कठीण असतो, पण त्यालाही फोडून त्याचे तुकडे करता येतात, ते करतांना दगडाचा थोडा बारीक चुराही निघतो, करवतीने लाकूड कापतांना त्याचाही पिठासारखा भुसा पडतो, गहू, ज्वारी वगैरे धान्ये दळल्याने त्यांचे पीठ होते वगैरे नित्याचे अनुभव आहेत. कुठलाही घनरूप पदार्थ कुटून, ठेचून किंवा घासून त्याची पूड करता येते, ते करतांना त्या पदार्थाचे बारीक कण वेगवेगळे होतात. यातल्या प्रत्येक कणांमध्ये मूळ पदार्थाचे सगळे गुण असतात. पावसाचे पाणी लहान लहान थेंबांमधून पडते आणि आता थंडीच्या दिवसात सकाळी आपल्याला पानांवरले दंवबिंदू दिसतील. ते तर आकाराने खूपच लहान असतात. थोडक्यात सांगायचे तर जगातल्या सगळ्या वस्तूंचे रूपांतर त्यांच्याच सूक्ष्म कणांमध्ये होऊ शकते.

चिमूटभर साखरेतले निरनिराळे कण डोळ्यांना दिसतात आणि बोटाने त्यांना वेगळे करता येतात. त्याची पिठीसाखर केली तर तिचे कण मात्र डोळ्यांनाही वेगवेगळे दिसत नाहीत आणि त्यातल्या एका कणाचा वेगळा स्पर्शही बोटाला जाणवत नाही. डोळे आणि त्वचा या आपल्या ज्ञानेंद्रियांच्या जाणीवा सुमारे एक दशांश मिलिमीटरपेक्षा सूक्ष्म आकाराच्या पदार्थांना ओळखत नाहीत. नाक आणि जीभ मात्र अधिक संवेदनाशील इंद्रिये आहेत. डोळ्यांना न दिसणा-या कणांचा गंध किंवा रुची यावरून ती वस्तू ओळखता येते. पण एका मर्यादेच्या पलीकडे तेसुद्धा शक्य नसते. अनेक सूक्ष्म कणांनी मिळून तयार झालेली चिमूटभर पिठीसाखर एकत्रितपणे डोळ्यांना दिसते आणि बोटांना जाणवते. हीच साखर पेलाभर पाण्यात घालून ढवळली की ती पाण्यात विरघळून जाते आणि पूर्णपणे अदृष्य होते. साखरेमुळे त्या पाण्याला आलेला गोडवा जिभेला जाणवतो या अर्थी ती साखर नष्ट झालेली नसते, पण पाण्यात विरघळण्याच्या क्रियेत तिचे कण अत्यंत सूक्ष्म झालेले असल्यामुळे ते मात्र डोळ्यांना मात्र दिसत नाहीत.

पदार्थांच्या अशा प्रकारे होत असलेल्या विघटनाच्या गुणधर्मांबद्दल विचार करतांना काही तत्वज्ञान्यांना असे वाटले की जगातले सगळे पदार्थ मुळात सूक्ष्म अशा कणांच्या समुदायामधूनच बनत असावेत. असे असंख्य कण एकमेकांना चिकटून त्याचा आकार बनतो आणि त्यांच्यामधले बंधन तोडल्यास ते वेगळे किंवा सुटे होतात. कोणताही पदार्थ वायुरूप असतो तेंव्हा हे सूक्ष्म कण इतस्ततः सुटे फिरत असतात, पण तो द्रवरूप झाला की ते एकमेकांना सैलसर चिकटतात आणि घनरूपात ते एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात. उदाहरणार्थ पाण्याची वाफ हवेत सगळीकडे विरून जाते, द्रवरूप पाणी एकत्र राहते, पण त्याला स्वतःचा आकार नसतो आणि त्याला गोठवून बर्फ केल्यास त्याचा ठोकळा बनवता येतो. तो आपला आकार टिकवून ठेवतो. हे सगळे कशामुळे होते हा प्रश्न होता. एक अज्ञात शक्ती या कणांना एकमेकांशी बांधून ठेवत असते एवढेच माहीत होते.

"कुठल्याही पदार्थाचे लहान लहान तुकडे करत गेल्यास अशी एक वेळ येईल की त्याचे आणखी लहान तुकडे होऊ शकणार नाहीत" असा सिद्धांत कणाद या भारतीय तत्वज्ञान्याने (वाटल्यास शास्त्रज्ञाने म्हणावे) मांडला होता. पदार्थांच्या या सर्वात लहान कणाला त्याने 'अणू' असे नाव दिले होते. 'वैशेषिक' नावाची तत्वज्ञानाची एक शाखा कणादमुनींनी सुरू केली होती. 'नैनम् छिन्द्यन्ति शस्त्राणि" असा हा अविभाज्य अणू त्या तत्वज्ञानानुसार अमर असतो. दोन किंवा तीन अणूंचे गट असू शकतात, निरनिराळ्या पदार्थांचे अणू एकमेकांशी संयोग पावून त्यातून वेगवेगळे नवे पदार्थ उत्पन्न होतात असे प्रतिपादनसुध्दा कणादाच्या या तत्वज्ञानात होते असे म्हणतात. या सगळ्या गोष्टी रसायनशास्त्रातल्या प्राथमिक आणि मूलभूत तत्वांशी ब-याच प्रमाणात जुळतात. पारंपारिक भारतीय शास्त्रांनुसार माती, पाणी, उजेड, वारा म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू आणि त्याशिवाय आकाश ही पंचमहाभूते समजली जातात. विश्वामधील कोणताही पदार्थ यांच्यामधूनच तयार होतो असे मानले जाते. या पंचमहाभूतांच्या जोडीला दिक्, काल, मन आणि आत्मा यांचाही विचार करून अशा एकंदर नऊ तत्वांमधून सर्व सजीव तसेच निर्जीव सृष्टी निर्माण झाली आहे असे महर्षी कणादमुनींनी प्रतिपादन केले आहे. हे देखील ढोबळमानाने पाहता बरोबरच आहे, पण स्पष्ट अस्तित्व असलेली माती किंवा पाणी, विचार किंवा भावना यांनीच समजता येत असलेले मन आणि पूर्णपणे काल्पनिक संकल्पना असलेला आत्मा यांची अशा प्रकारे एकत्र मिसळ करणे सायन्समध्ये बसत नाही.

मूलद्रव्य (Elements), संयुग (Compounds) किंवा मिश्रण (mixtures) यापैकी एकात जगातील सर्व वस्तूंची गणना होते. हे सत्य कणादमुनींच्या काळात बहुधा प्रस्थापित झालेले नसावे. त्यामधील मूलद्रव्य आणि संयुग यांना विशिष्ट गुणधर्म असतात आणि त्यांचे मिश्रण केले तरी ते गुण टिकून राहतात. सर्व पदार्थांच्या या तीन वर्गात केलेल्या विभाजनामुळे त्यांचे सर्वात लहान कण या अर्थाने Atom आणि molecule  हे शब्द वापरात आले आणि या इंग्रजी शब्दांसाठी अणू, परमाणू, रेणू वगैरे मराठी प्रतिशब्द आता रूढ झाले आहेत. (त्यातसुध्दा अनुक्रमे परमाणू व अणू आणि अणू व रेणू असे दोन पाठभेद आहेत.) अणू या शब्दाचा कणादमुनींना अभिप्रेत असलेला अर्थ कशा प्रकारचा होता कोण जाणे, पण तो Atom किंवा molecule या शब्दांच्या सध्या प्रचलित असलेल्या अर्थांपेक्षा निश्चितपणे निराळा होता. अणू या कणादमुनींच्या संकल्पनेचा आकार, वजन, क्रमांक, विद्युत भार, त्याची अंतर्गत रचना अशा प्रकारची कसलीही शास्त्रीय माहिती कुणादमुनींच्या तत्वज्ञानात दिलेली आहे असे माझ्या अल्पशा वाचनात मला तरी कुठे आढळले नाही. अणू हे सर्व पदार्थांचे अतीसूक्ष्म असे कण आहेत असे मात्र बहुधा त्यांनीच पहिल्यांदा खूप पूर्वी सांगितले होते एवढे सर्वमान्य आहे. जगातले सगळेच ज्ञान ब्रह्मदेवाने वेदांमधून काही निवडक ऋषींना दिले होते असा ज्यांचा दृढ समज आहे अशा लोकांच्या दृष्टीने पाहता कणादमुनींनी देखील हे ज्ञान वेदाध्यनामधून प्राप्त केले असेल तर त्यांना अणूचे आद्य संशोधक म्हणता येणार नाही. शिवाय प्राचीन काळामधील काही जैन मुनी आणि डेमॉक्रिटस नावाचा ग्रीक फिलॉसॉफर यांनीसुध्दा परमाणू आणि अॅटम या सूक्ष्म कणांची कल्पना केलेली होती असेही सांगितले जाते. प्राचीन काळामधले हे सगळे प्रयत्न फक्त अचाट कल्पनाशक्ती आणि तर्कशुध्द विचार यांमधून केले गेले होते. प्रात्यक्षिके, प्रयोग, निरीक्षण, परीक्षण, गणित वगैरेंमधून त्यांना जोड देऊन ते विचार शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध केले गेले नव्हते, तसेच अणू, परमाणू, रेणू वगैरे शब्दांच्या व्यवस्थित शास्त्रीय व्याख्या केलेल्या नव्हत्या.

अणू हे सूक्ष्म सूक्ष्म म्हणजे नेमके किती सूक्ष्म असतात हे बहुतेक लोकांना माहीत नसते. अब्ज, खर्व, निखर्व, परार्ध वगैरे संख्यांचा नेमका अर्थही सहसा कोणाला समजत नाही. यापेक्षा तुलनेने असे सांगता येईल की भारताची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या कित्येक पट अणू धुळीच्या एका कणात असतात. अशा प्रकारच्या अवाढव्य संख्या १, २, ३, ४ असे करून मोजता येत नाहीत. त्यासंबंधी काही सिद्धांत मांडले जातात, त्यांच्यासोबत काही समीकरणे येतात, प्रयोगांमधून मिळालेल्या माहितीवरून किचकट आकडे मोड करून त्या ठरवतात. हे सिद्धांत आणि समीकरणे अनेक शास्त्रज्ञांनी तपासून पाहिल्यानंतर त्या आकड्यांना सर्वमान्यता मिळते. कणादमुनींच्या कालखंडात हे सगळे झाले असल्याचा निर्देश कुठे दिसत नाही. 



 . . . .  . . . . . . . . . . .  . . (क्रमशः)

Tuesday, October 22, 2013

स्मृती ठेवुनी जाती - १० मालिनी खासगीवाले

कै.श्रीराम परांजपे हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि ख्यातीप्राप्त इंजिनियर होते, त्यांच्या निधनाची बातमी वर्तमानपत्रांमध्ये छापून आली. कै.मालिनीताई खासगीवाले प्रसिध्दीपासून दूर राहिलेल्या समाजसेविका होत्या. त्या कधी निजधामाला गेल्या हे मलाही समजले नाही. परांजप्यांची ओळख माझ्या नोकरीमध्ये झाली, तर मालिनीताईंची ओळख नातेसंबंधांमधून झाली. परांजपे यांचा आणि माझा परिचय सत्तेचाळीस वर्षांपूर्वी झाला आणि थोडाच काळ राहिला तर गेली चाळीस वर्षे नेहमीच मालिनीताईंची अधूनमधून भेटगाठ होत राहिली होती. माझ्या दृष्टीने पाहता या दोन्ही व्यक्ती मला वडीलधा-या आणि आदरणीय होत्या, त्या कायम लक्षात राहण्यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण होत्या आणि त्यांचे निधन काही काळापूर्वी झाले एवढाच त्यांना जोडणारा मुख्य धागा म्हणता येईल. यामुळे मी या दोन लेखात या दोघांचा एकापाठोपाठ एक समावेश केला आहे. त्यांचा एकमेकांशी परिचय असण्याची बरीच शक्यता होती, त्या एकमेकांना भेटल्या असाव्यात किंवा वारंवार भेटत असतीलही, पण त्याच वेळी मीसुध्दा त्या जागी उपस्थित होतो असे मात्र कधी झाल्याचे मला आठवत नाही.

माझ्या काही मित्रांना एका प्रॉजेक्टसाठी वर्षभरासाठी फ्रान्सला पाठवायचे ठरले तेंव्हा त्यांच्याकडून एक बाँड घेतला गेला. त्या बाँडवर कोणा वरिष्ठ दर्जाच्या अधिका-याची गॅरंटीयर म्हणून सही पाहिजे होती. त्या मित्रांचे वरिष्ठ अधिकारी स्वतःच त्या टीममध्ये जात असल्यामुळे ते सही देऊ शकत नव्हते. यामुळे इतर मित्रांचे नातेवाईक, नातेवाईकांचे मित्र, शेजारी वगैरेंमधून माझे मित्र त्यांच्यासाठी गॅरंटीयर शोधत होते आणि त्यांना ते मिळाले. त्यातल्या एका मित्राने मला आनंदाने सांगितले, "चला, आज माझं काम एकदाचं झालं, केमिस्ट्री डिव्हिजनमधल्या डॉ.खासगीवाल्यांनी मला सही दिली."     
त्या वेळी डॉ. कारखानावाला नावाचे पारशी सद्गृहस्थ केमिस्ट्री डिव्हिजनचे डायरेक्टर होते. हा खासगीवाला त्यांचाच सगेवाला असावा असे वाटून मी म्हंटले, "हा पारशी कसा काय तयार झाला?" 
मित्राने सांगितले, "अरे ते कोणी खासगीवाला नाहीत, पुण्याचे घरंदाज खासगीवाले आहेत." खासगीवाले हे नाव मी पूर्वी कधी ऐकले नसल्याने मला मराठी वाटत नव्हते. त्यांच्या पूर्वजांमधल्या कोणाला पेशव्यांच्या काळात ही उपाधी मिळाली होती असे स्पष्टीकरण त्यावर मिळाले. माझ्या मित्राशी जुजबी ओळखपाळखसुद्धा नसतांना त्याच्यावर एवढा विश्वास टाकून आर्थिक धोका पत्करणा-या त्या उदार मनाच्या सद्गृहस्थांबद्दल माझ्या मनात आदरयुक्त कुतूहल निर्माण झाले. आपण एकदा त्यांना पहावे, भेटावे असे वाटले, पण माझा मित्र तर फ्रान्सला निघून गेला होता, आता मला त्यांच्याकडे कोण नेणार? यामुळे ते राहून गेले.

माझे लग्न झाल्यानंतर अलकाचे सगळे नातेवाईक माझे आप्त झाले. तिच्या लहान गावातल्या माहेरच्या पुरातन आणि अवाढव्य वाड्यात तीन पिढ्यांमधले बरेचसे लोक रहात असत, अजूनही राहतात. शिक्षण आणि नोकरीच्या निमित्याने बाहेरगावी राहणारी मुले आणि लग्न होऊन सासरी गेलेल्या माहेरवाशिणीसुध्दा वर्षामधून काही काळासाठी सवड काढून तिथे येऊन सर्वांच्या सहवासात रहात आले आहेत. त्यामुळे त्या सर्वांमध्ये खास जवळीक निर्माण झाली आहे. चुलत बहिणींचे दीर, जावा, नणंदा किंवा चुलत चुलत काकूंचे भाऊ, वहिनी यासारखे दूरचे नातेवाईकसुध्दा तिथल्या बहुतेकांना माहीत असतात. एकदा अलकाच्या एका चुलत चुलत बहिणीकडे आम्ही गेलो असतांना त्यांनी मला विचारले, "तुम्ही बीएआरसीमधल्या डॉ.खासगीवाल्यांना ओळखत असालच ना?"
"मी त्यांचं नाव ऐकलं आहे, पण आमची अजून प्रत्यक्ष भेट झाली नाही. आमचं डिपार्टमेंट एवढं मोठं आहे की काम पडल्याशिवाय सहसा कोणाची ओळख होत नाही."
"अहो, आमचे हे मामा आणि आमच्या या मामीसुद्धा फारच चांगली माणसं आहेत, तुम्ही त्यांना भेटाच."
त्यावर अलका म्हणाली, "हो, मला ते लोक माहीत आहेत. ते कुठे राहतात?"
"तेसुद्धा तुमच्या चेंबूरलाच राहतात."
"हो का? मग नक्की भेटू."
या मामामामी म्हणजे डॉक्टर आणि मालिनीताई खासगीवाले या व्यक्तींची माझी पहिली ओळख ही अशी सांगण्या ऐकण्यातून झाली. मला देखील त्या दोघांना भेटण्याचे कुतूहल आणि इच्छा होतीच, त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी मला एक धागाही मिळाला. पण संधी आणि वेळ मिळत नव्हता. त्यांचा पत्ता वगैरे लिहून घ्यायचेही राहून गेले होते. प्रयत्न करून मला तो मिळू शकला असता, पण तेवढे कष्ट घेतले गेले नाहीत. एकदा मी ऑफिसला गेलेलो असतांना आणि काही कामासाठी अलका कुठेतरी गेली असतांना तिला चेंबूरच्या बाजारात की बसमध्ये खासगीवाले मामी अचानक दिसल्या. समोरासमोर येताच, "मामी!", "तू अलका ना?" अशा संवादामधून त्यांनी आपल्या स्मरणातले जुने धागे पुन्हा जोडून घेतले. खरे तर मामींना त्या वेळी अलकाला त्यांच्या घरीच घेऊन जायचे होते, पण त्या काळात टेलीफोन, मोबाईल वगैरे काही सोय नसल्याने मला निरोप कसा द्यायचा हा प्रश्न होता आणि मी ऑफीसातून घरी येऊन दारावर लागलेले कुलूप पाहिले असते तर गोंधळ झाला असता. "पुढच्या वेळी आम्ही चेंबूरच्या मार्केटमध्ये येऊ तेंव्हा नक्की तुमच्या घरी येऊ." असे आश्वासन देऊन अलकाने त्यांच्या घराचा पत्ता आणि जवळपासच्या खुणा विचारून घेतल्या.

त्या काळात आम्ही चेंबूरच्या सिंधी कँपमध्ये रहात होतो. तिथले सगळे वड्डी साँई दुकानदार आमच्यासारख्या भोळ्या भाबड्या ग्राहकांना गंडवायला टपून बसले आहेत असा आमचा ग्रह झालेला असल्यामुळे आम्ही नेहमी खरेदीसाठी चेंबूर स्टेशनजवळच्या बाजारात जात होतो. आम्ही पुढल्या खेपेला तिकडे गेलो तेंव्हा खासगीवाल्यांचे घर शोधून काढले. ते हमरस्त्यावरच असल्यामुळे सहजच सापडले. आम्हाला पाहून त्या दोघांनाही खूप आनंद झाला. त्यांनी अत्यंत आपुलकीने आमचे स्वागत केले. आम्ही कुठे राहतो, तिथे आमचे बस्तान कसे बसले आहे, काही अडचणी आहेत का वगैरेची वडिलधा-या माणसांच्या मायेने चौकशी केली, आमच्या कुटुंबांमधल्या समाईक नातेवाईकांची विचारपूस केली. थोडे बसणे बोलणे झाल्यानंतर "आमच्या स्वैपाकाची तयारी सुरू झालेलीच आहे, आता रात्रीचे जेवण करूनच जा," असा आग्रहही मामींनी केला. पण असे आगांतुकपणे कुणाच्या घरी जायचे आणि थेट पाटावर जाऊन बसायचे हे माझ्यातल्या जावयाला शोभणारे नव्हते. माझे आढेवेढे पाहून मामांनी ते ओळखले आणि पुढे कित्येक वर्षे ते मला "या जावईबापू !" असेच गंमतीने म्हणत राहिले.

त्या दिवशी मामींनी आम्हाला निदान सूप तरी पिऊन जायला सांगितले आणि पोटात भूक लागलेली असल्याने आम्हीही ते आनंदाने मान्य केले. त्यापूर्वी म्हणजे लहानपणी आमच्या घरी टमाट्याचे सार बनवले जात असे ते रस्समसारखे पाणीदार असायचे. चिनी हॉटेलांमधले सूप चांगले दाट असायचे पण ते बेचव वाटायचे. मामींनी तयार केलेले सूप तसेच दाट होते, पण त्याला मराठी माणसाला आवडावी अशी रुची आणि खास फ्लेव्हर होता, शिवाय त्यात थोडे ताजे लोणी किंवा क्रीम घालून त्याची चंव आणखी वाढवली असावी. असे अप्रतिम सूप मी पहिल्यांदाच चाखून पाहिले होते हे मी मोकळेपणे सांगून टाकले. त्यांना त्याची खात्री असावीच. पहिला बाउल संपताच त्यांनी लगेच तो भरून दिला. त्याबरोबर दिलेल्या साइड डिशेस खाऊन आमचे तसेही जवळ जवळ पोटभर जेवण होऊन गेले. "चेंबूरला बाजार करायला केंव्हाही आलात तर थोडी विश्रांती घ्यायला आमच्याकडे याच, शिवाय तुम्हाला पुन्हा कधी सूप प्यावेसे वाटले तर निःसंकोचपणे मुद्दाम आमच्या घरी म्हणूनही या." असे मामींनी निरोप देतांना प्रेमाने सांगितले. आमची मुले लहान असतांना आम्हालाही त्यांचे कपडे बदलणे, त्यांना दूध पाजणे वगैरेंसाठी निवा-याची जागा लागत असायची आणि आम्ही खासगीवाल्यांकडे अधून मधून जात राहिलो. एकदा आम्ही बाजारहाट करतांना माँजिनीमधून घेतलेल्या सामानातले सूपस्टिक्सचे पॅकेट मामींनी पाहिले आणि आपणहून सूपसाठी टोमॅटो शिजवायला ठेवले. त्यांनी वेळोवेळी इतर अनेक चविष्ट पदार्थही कौतुकाने करून आम्हाला खाऊ घातले.  

मामा तर रसायनशास्त्रातले डॉक्टरेट होतेच, मामीसुध्दा नुसत्या सुग्रण हाउसवाइफ नव्हत्या. त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून काही पदव्या आणि पदविका घेतल्या होत्या आणि त्या महाराष्ट्र शासनाच्या समाजविकास किंवा अशाच एकाद्या खात्यात अधिकारीपदावर होत्या. अनाथ, निराधार बालके किंवा महिलांसाठी चेंबूर मानखुर्द भागातच तीन चार वसतीगृहे आहेत, मुंबईमध्ये आणखी किती तरी असतील. अशा प्रकारच्या संस्थांच्या कामाशी मालिनीताई निगडित होत्या. या कामात त्यांना अनेक बरेवाईट, जास्त करून वाईटच अनुभव अनेक वेळा येत, काही वेळा त्यांना त्या संस्थांमध्ये जाऊन मुक्कामाला तिकडेच रहावे लागत असे. अशा वेळी त्यांची ओढाताण होत असे. एरवी त्या आपला वेळ नोकरी आणि घरगृहस्थी यांमध्ये व्यवस्थितपणे वाटून देत असत, कधी कधी कामामध्ये आणीबाणीचे प्रसंग आले तर मात्र त्यांना ताबडतोब तिकडे धावावे लागत असे. पण हे सगळे काम त्या हंसतमुख राहून, शांत चित्ताने, तळमळीने आणि मन लावून करत असत. त्याबद्दल त्यांनी तक्रारीच्या सुरात बोललेले मी कधीच ऐकले नाही. त्या वसतीगृहांमधल्या दुर्दैवी स्त्रिया आपल्या किंवा सर्वसामान्य लोकांच्या मानाने किती हाल अपेष्टा आणि मानसिक त्रास भोगत आहेत, त्यांच्या जीवनात किती असुरक्षितता आहे याची त्यांना खूप कणव वाटत असे आणि त्यांना कशा प्रकारे मदत करता येईल, त्यांचे कष्ट कसे कमी करता येतील याचे विचार त्यांच्या मनात घोळत असत. उंबरठा हा चित्रपट पाहतांना माझ्या डोळ्यासमोर मालिनीमामी येत राहिल्या. त्या सिनेमातल्या स्मिता पाटीलला तिच्या घरातून तीव्र विरोध झाल्यामुळे तिला घराचा उंबरठा ओलांडून जावे लागले होते. मामींच्या सुदैवाने मामा त्यांच्या पाठीशी उभे असल्याने त्यांच्या जीवनात असले द्वंद्व आले नाही. त्यांना भरपूर कसरत किंवा धावपळ मात्र करावी लागत असे.

खासगीवाले मामा इतके सीनियर होते की त्यांना अणुशक्तीनगरमध्ये चांगले प्रशस्त क्वार्टर सहज मिळू शकले असते, पण मामींना गरज पडताच पटकन कुठेही जाण्यायेण्यासाठी चेंबूर स्टेशनजवळ असलेली लहानशी जागा जास्त सोयीची होती. त्यामुळे ते दोघेही तिथेच राहिले. मामांना रिटायर होऊन आता वीस वर्षे तरी होऊन गेली असतील. त्यांच्या काही काळानंतर मामीही सेवानिवृत्त झाल्या. त्यानंतर ते दोघे पनवेलला बांधलेल्या त्याच्या नव्या आणि मोठ्या घरात रहायला गेले आणि आमच्या भेटी दुर्मिळ झाल्या. मामा शास्त्रज्ञ आहेत त्याबरोबर उत्तम संगीतज्ञही आहेत, ते स्वतः तबला वाजवून अनेक गायक कलाकारांना साथ देत असत. वयोमानानुसार त्यांचे वादन कमी होत गेले तरी चेंबूर भागातल्या सगळ्या मुख्य संगीत सभांना एक जाणकार श्रोता म्हणून ते पनवेलहूनसुद्धा आवर्जून येत राहिले. मामींनाही गायनाची आवड असल्याने बहुतेक वेळी त्यासुद्धा त्यांच्यासोबत येतच असत. अशा ठिकाणी आमच्या भेटी आणि गप्पा होऊ लागल्या. 

पण वयोमानानुसार पुढे पुढे ते भेटणे हळूहळू कमी होत गेले आणि त्यांना तसेच आम्हालाही तपासण्या किंवा औषधोपचार यासाठी हॉस्पिटलला जाण्याची जास्त गरज पडू लागली. गेल्या चार पाच वर्षात आमच्या भेटी बहुधा हॉस्पिटलमध्येच झाल्या असाव्यात. मागच्या वर्षीच एकदा आम्ही दोघे हॉस्पिटलच्या मेडिकल ओपीडीमध्ये आमचा नंबर येण्याची वाट पहात बसलो होतो. अलकाची प्रकृती जरा जास्तच खराब झालेली असल्यामुळे ती डोळे मिटून स्वस्थ बसली होती. खासगीवाले मामामामीही त्यांच्या फॉलोअप व्हिजिटसाठी आले होते. आमची नजरानजर होताच मी त्यांना हात दाखवला. पण नेहमीप्रमाणे आम्ही दोघे लगेच त्यांच्याकडे गेलो नाही यावरून काही तरी घोळ आहे हे त्यांच्या लक्षात येताच ते दोघे उठून आमच्याकडे आले. पाठीवरून हात फिरवून धीर दिला, "सगळं ठीक होऊन जाईल, काळजी करू नको" वगैरे सांगितले आणि आमच्याजवळ बसून राहिले. हॉस्पिटलमध्ये आलेले असले तरी ते दोघे तसे ठीकच दिसत होते, मामांच्या शरीरावरल्या वृद्धापकाळाच्या खुणा गडद होत होत्या, त्यांना त्या त्रस्त करतांना दिसत होत्या, त्यांची श्रवणशक्ती मंदावली होती, त्यामुळे संवाद साधणे कठीण जात होते, पण मामी पूर्वीसारख्याच चुणचुणीत दिसत होत्या त्यांना कसलाही त्रास होत नसावा असे त्यांच्या देहबोलीमधून आणि चेहे-यावरून वाटत होते.

दीड दोन महिन्यापूर्वी डॉक्टरांना प्रकृती दाखवण्यासाठी अलका हॉस्पिटलमध्ये गेली होती. त्या दिवशी जरा जास्त गर्दी असल्यामुळे तिचे काम संपायला बराच उशीर झाला. तोंवर जेवायची वेळ होऊन गेली होती. त्यामुळे तिच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने तिला लवकर घरी परतणे आवश्यक होते. हॉस्पिटलमधून बाहेर निघण्याच्या वाटेवर तिला अचानक खासगीवाले मामा भेटले. मामींना वॉर्डमध्ये अॅडमिट केले असून त्यांच्यावर केमोथिरपी होत असल्याचे धक्कादायक वृत्त त्यांनी सांगितले. पण हॉस्पिटलच्या नियमानुसार ती पेशंटला भेटण्याची वेळ नव्हती आणि त्यासाठी तीन चार तास तिथे थांबणे अलकाला शक्यच नव्हते. या ट्रीटमेंटने मामी लवकरच ब-या होतील असेच तेंव्हा वाटत होते. सवडीने पुन्हा जाऊन त्यांना भेटावे असा विचार करून ती घरी आली. पण तिच्या स्वतःच्या आजारपणामुळे आणि त्यातून आलेल्या अशक्तपणामुळे त्या वेळी ते जमले नाही. मामा किंवा मामींबरोबर संपर्क नसल्यामुळे त्या हॉस्पिटलमध्ये आहेत की घरी गेल्या आहेत हेही समजायला मार्ग नव्हता. त्यामुळे शक्य झाल्यानंतरसुध्दा त्यांना कुठे जाऊन भेटायचे हे समजत नव्हते.

दहा बारा दिवसांपूर्वी आम्ही तिस-याच एका गावी गेलो असतांना मामांचा एक सख्खा भाचा तिथे आम्हाला भेटला तेंव्हा त्याच्याकडून कळले की मामी कालवश झाल्या. ही दुःखद बातमी मुद्दाम कोणालाही सांगायची नाही असे मामांनी त्यांच्या निकटवर्तीयांना सांगून ठेवले होते. त्या दोघांनीही त्यांच्या सद्वर्तनाद्वारे असंख्य माणसे जोडून ठेवली होती. ही बातमी ऐकून त्या सर्वांना धावत यावेसे वाटेल आणि त्यांना ते कष्ट पडू नयेत असा विचार त्याच्या मागे होता. कदाचित मामींनी स्वतःच तसे सांगून ठेवले असेल. त्या नेहमी दुस-यांचाच विचार करत असत. त्यामुळेच त्यासुध्दा सर्व परिचितांच्या स्मरणात चिरकाल राहणार आहेत यात शंका नाही.

Sunday, October 20, 2013

स्मृती ठेवुनी जाती - ९ - श्रीराम परांजपे ( एस.आर.परांजपे )

इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण होताच माझी अणुशक्ती खात्यात निवड झाली आणि त्यांच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये माझे प्रशिक्षण सुरू झाले. त्याची सुरुवात फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स यासारख्या विज्ञानाच्या मूलभूत शाखांच्या शिक्षणापासून झाली. निसर्गाच्या कोणत्या नियमांमुळे आणि सिध्दांतानुसार अणुशक्ती निर्माण होते याचे फिजिक्स, ती कोणकोणत्या नैसर्गिक पदार्थांपासून होते याची केमिस्ट्री आणि ते सगळे किती प्रमाणात होते याचे गणित समजून घेण्यासाठी त्याच्या संबंधातली इत्थंभूत पायाभूत माहिती असायला हवी हा यामागचा दृष्टीकोण असावा. विज्ञान आणि गणित हे विषय मला शाळेत असतांनापासून आजपर्यंत प्रिय असले तरी महत्प्रयासाने इंजिनियरिंगची डिग्री घेतल्यानंतर त्यावर काहीतरी प्रत्यक्ष काम करण्याची मी आतुरतेने वाट पहात होतो. त्यामुळे या सैध्दांतिक किंवा पुस्तकी शिक्षणासाठी त्या वेळी आमच्यापैकी कोणीच फारसा उत्सुक नव्हता.

आम्हाला हे विषय शिकवणारे कोणतेही शिक्षक कॉलेजातले प्रोफेसर नव्हते. आमच्याहून पाच सहा वर्षे वयाने मोठे आणि एकच ग्रेड वरच्या हुद्द्यावर आमच्याच खात्यात काम करणारे निरनिराळे अधिकारी येऊन थोडा थोडा भाग शिकवून जात होते. त्या काळातले आमचे ट्रेनिंग स्कूल मुंबईतल्या मरीन लाइन्सवर होते आणि आमच्या लेक्चरर्सना तिथे येण्याजाण्यासाठी ऑफिसचे व्हेइकल कधी मिळाले तर मिळत असे, कधी मिळतही नसे. त्या काळातल्या लालफितीमधून टॅक्सीभाड्याचे ऱिइंबर्समेंट मिळवणे फार जिकीरीचे काम होते आणि त्या काळातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही चांगली नव्हती. शिवाय मुलांना शिकवणे हे त्या लोकांचे मुख्य काम नव्हतेच. यामुळे त्यांच्यातल्या काहीजणांना या कामात मनापासून रस वाटत नसे. केवळ नोकरीचा भाग म्हणून ते लोक हा जुलमाचा रामराम करून जात. कधी कधी ते मरीन लाइन्सला येऊच शकत नसत आणि त्यांना दिलेला पोर्शन उरलेल्या पीरियड्समध्ये कसाबसा कव्हर करून टाकत असत. आमच्या बॅचमधली बहुसंख्य मुले मुंबईबाहेरून आलेली होती, त्यांच्या हातात पहिल्यांदाच त्यांच्या हक्काचे पैसे पडत होते, ट्रेनिंगच्या सुरुवातीला बराचसा मोकळा वेळही मिळत होता. यामुळे आम्ही बहुतेक सगळी मुले जमेल तेवढी आपापल्या जिवाची मुंबई करून घेत होतो. असा सगळा आनंद होता. 

रिअॅक्टर इंजिनियरिंग हा नवा विषय सुरू होणार असल्याची बातमी येतांच सर्व मुलांना खूप आनंद झाला. आपल्याला आता काही तरी प्रत्यक्ष कामाचे शिकायला मिळेल असे सर्वांना वाटले. त्यासाठी एस.आर.परांजपे नावाचे लेक्चरर येणार असल्याचे समजले आणि मराठीभाषी मुले जरा जास्तच खूष झाली. आम्ही त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहू लागलो. पहिल्या पीरियडची वेळ झाली तरी परांजपे सर आले नव्हते. त्यांच्या आगमनाची आणखी पाच दहा मिनिटे वाट पहायची आणि जवळच्या इराणी किंवा उडपी हॉटेलात किंवा मरीन ड्राइव्हच्या मसुद्गकिना-यावर जाऊन बसायचे असे आमचे बोलणे चालले असतांनाच ते धावतपळत आणि कपाळावरला घाम टिपत टिपत क्लासरूममध्ये येऊन धडकले. शिडशिडीत शरीरयष्टी, जाड भिंगांचा आणि जाड फ्रेमचा चश्मा, चेहे-यावर भोळसट वाटावा इतका सौम्य भाव वगैरेंमुळे त्यांचे पहिले इम्प्रेशन काही फारसे चांगले उमटले नाही. वयाने आणि हुद्द्याने ते आमच्यापेक्षा निदान बारा तेरा वर्षांनी सीनियर असले तरी आपण मोठे ऑफिसर असल्याचा कसलाच रुबाब त्यांच्या वागण्यात किंवा बोलण्यात दिसला नाही. त्या वेळी तर ते एकाद्या म्युनिसीपालिटीच्या शाळेतल्या मास्तरासारखे दिसत आणि वावरत होते, त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि पहिल्याच वाक्याच्या एका शब्दात अडखळून न्नन्नन्नन्न असा चमत्कारिक उच्चार यायला लागल्यावर तर मुलांची साफ निराशा झाली.

मागच्या बाकावर बसलेल्या मुलांची कुजबूज वाढून त्याला गोंगाटाचे रूप आले, तरीही सरांनी तिकडे अजीबात लक्ष न देता त्यांचे किंचित तोतरे बोलणे चालूच ठेवले. त्यांनी बहुधा पूर्वीच्या काही बॅचेसनाही शिकवले असावे आणि त्यांना या सगळ्याची संवय झाली असणार. समोरच्या बेंचांवर बसलेल्या मुलांवर आपले लक्ष केंद्रित करून त्यांनी शांतपणे आपला विषय शिकवायला सुरुवात केली. परांजपे सरांनी त्यासाठी भरपूर पूर्वतयारी केलेली होती. विषयावर तर त्यांचे प्राभुण्य होतेच, त्यासंबंधीची सर्व इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे त्यांच्या अगदी नखाग्रांवर (फिंगरटिप्सवर) होती. त्याची सुरेख प्रकारे मांडणी करून ती मनोरंजक पध्दतीने सांगायला त्यांनी सुरुवात केल्यानंतर मात्र बाकीची मुलेही त्यात गुंगून गेली.

बिलियर्डमधल्या चेंडूसारखा सारखा एक न्यूट्रॉन येऊन युरेनियमच्या एका अणूला धडकतो आणि त्याचे विखंडन करून त्यातून आणखी न्यूट्रॉन जन्माला येतात, ते पुढे आणखी युरेनियमच्या अणूंचे विखंडन करत जातात अशा प्रकारचे सोपे चित्र न्यूक्लियर फिजिक्स शिकत असतांना आमच्या मनात तयार झालेले होते. प्रत्यक्षातल्या रिअॅक्टरमध्ये युरेनियमचे कित्येक परार्ध अणू वास करत असतात. आणि दर सेकंदाला कित्येक अब्ज न्यूट्रॉन येऊन युरेनियमच्या निरनिराळ्या अणूला धडकत असतात किंवा इतर पदार्थांमध्ये ते शोषून घेतले जात असतात, क्षणोक्षणी जन्माला येऊन लगेच नष्ट होणा-या न्यूट्रॉन्सचा एक महाप्रचंड घोळका रिअॅक्टरमध्ये घोंघावत असतो हे एक वेगळे चित्र परांजपे सरांनी छान उभे केले. १९४२ साली डॉ.एन्रिको फर्मीने यशस्वीरीत्या तयार केलेल्या पहिल्या पाईलपासून ते पुढील दोन शतकांमध्ये झालेल्या अनेक प्रकारच्या प्रयोगांमधून अणुशक्तीचा विकास कसा होत गेला, गोल, चौकोनी, षट्कोनी, उभे. आडवे, लांबट, बसकट वगैरे निरनिराळ्या आकारांचे असंख्य प्रकारचे लहानमोठे रिअॅक्टर्स अनेक देशांमध्ये तयार केले गेले, त्यातले काही चालले, बरेचसे चाललेच नाहीत, युरेनियम, प्ल्युटोनियम यासारखी इंधने आणि त्यांच्या जोडीला साधे पाणी, जड पाणी (हेवीवॉटर), कार्बन डायॉक्साइड, सोडियम वगैरे पदार्थांचा उपयोग त्यात कसा केला गेला, त्यांचे परिणाम काय झाले, वगैरेंचे सुसंगत आणि सविस्तर असे वर्णन त्यांनी केले. हा विषय रोचक होताच, परांजपे सरांनी तो फारच चांगल्या रीतीने समजावून सांगितला. ते करता करता अमेरिका, रशीया, इंग्लंड, फ्रान्स, कॅनडा वगैरे देशांनी त्यातल्या निरनिराळ्या पध्दतींवर जास्त भर का दिला आणि भारताच्या दृष्टीने त्यातले काय शिकण्यासारखे आणि फायद्याचे आहे हेसुध्दा ते सांगत गेले. त्यांनी जे काही सांगितले ते सर्वांच्या स्मरणात पक्के रुतून बसले.

लेक्चर झाल्यानंतरसुध्दा परांजपेसर थांबून रहात, मुलांनी विचारलेल्या कोणत्याही शंकेचे उत्तर देतांना त्याचे समाधान होईपर्यंत त्याचे विवेचन करून समजावून सांगत. काही मुले अवांतर प्रश्नही विचारत. त्या काळात फॉरेनला जाण्याची प्रचंड क्रेझ होती कारण ती संधी फार थोड्या लोकांना मिळत असे. त्यामुळे "सर, तुम्हाला कधीतरी फॉरेनला जायचा चान्स मिळाला का हो?" अशी जराशी तिरकस पृच्छा एका वात्रट मुलाने करताच "निदान सात आठ वेळा तरी मी कुठे कुठे जाऊन आलो असेन." असे त्यांनी अगदी शांतपणे सांगताच वर्गातल्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अणुशक्ती खात्यात ते किती मोठ्या पोस्टवर आहेत याची तोपर्यंत कोणाला कल्पनाच नव्हती. "आमचे ट्रेनिंग संपल्यावर आम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये घ्याल का?" असे काही मुलांनी त्यांना विचारल्यावर सरांनी त्यांनाच उलट विचारले, "तुम्हाला चेस आणि ब्रिज खेळायला येते का?" हे ऐकून सगळे गारेगार झाले. परांजपे सर ज्या प्रकल्पावर काम करत होते तो मंजूरीसाठी बराच काळ सरकार दरबारी रखडत पडला असल्यामुळे त्यावर काम करणा-या लोकांना वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडला होता असा त्याचा अर्थ होता असे नंतर कळले. 

रिअॅक्टर इंजिनियरिंग या विषयाचा जेवढा भाग परांजपे सरांना दिला होता तो शिकवून संपल्यावर पुढील भागांसाठी त्यांच्या ऐवजी त्यांचेच सहकारी दिवेकर सर आले. त्यानंतरच्या काळात अणुशक्ती विभागाच्या काही कार्यक्रमांमध्ये परांजपे सर आम्हाला अधून मधून भेटत, दर वेळी त्यांना नमस्कार करताच तेसुध्दा लगेच ओळख दाखवून आमची विचारपूस करत. असा जवळ जवळ दीड वर्षांचा काळ उलटून गेला आणि परांजपे सरांचा फास्ट ब्रीडर टेस्ट रिअॅक्टर (एफबीटीआर) मार्गाला लागल्याची बातमी आली. हा प्रकल्प फ्रान्सच्या सहाय्याने उभारला जाणार होता. तोपर्यंत परांजपे सरांच्या हाताखाली काम करणारा एक लहानसा सेक्शन होता. पण प्रॉजेक्टचे काम पाहण्यासाठी त्याचा खूप मोठा विस्तार करावा लागणार होता. त्यामुळे बीएआरसीमधल्या अनेक लोकांनी त्यात सामील होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आनंद दीक्षित आणि रवीन्द्र काळे या माझ्या मित्रांचीही त्यात निवड झाली. त्यातल्या दीक्षितच्या बरोबरच मी त्या काळात एका फ्लॅटमध्ये रहात होतो. त्यामुळे "एसआरपींनी आज हे केले, ते केले, असे सांगितले, तसे सांगितले ..."  वगैरे मधून त्यांचा उल्लेख आमच्या रोजच्या बोलण्यात होऊ लागला आणि त्यामधून त्यांची एक आणखी वेगळी प्रतिमा मनात तयार होत गेली.

ते नुसते बोलघेवडे शिक्षक नव्हते, कोट्यवधी रुपये खर्चाच्या एका मोठ्या प्रॉजेक्टची संपूर्ण जबाबदारी पेलण्याची क्षमता त्यांच्यात होतीच. त्याचे सारे सविस्तर प्लॅनिंग, त्यात पडणारी कामे आणि त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ यांची जुळवाजुळव करणे, त्यानंतर ती कामे सुयोग्य सहाय्यकांना वाटून देणे, त्यांच्यामध्ये सामंजस्य राखणे ही महाकर्मकठीण कामे ते व्यवस्थितपणे सांभाळत होते. अणुशक्तीखात्यात आणि बाहेरील अनेक वरिष्ठांशी त्यांच्या चांगल्या ओळखी होत्या. ते वरून जेवढे साधेसुधे दिसायचे तेवढेच पक्के आतल्या गाठीचे होते. त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे हे सहजासहजी कोणाला कळून देत नसत. त्यांच्या काही आवडीनिवडी होत्या, छंद होते, त्यातला एक होमिओपाथी हा होता. असे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू त्यामधून समोर येत गेले. ठरल्याप्रमाणे त्यांच्या टीमसह ते वर्षभरासाठी फ्रान्सला जाऊन आले आणि लवकरच कल्पकमला चालले गेले. त्यानंतर त्यांची भेट होण्याचे योग दुर्मिळ होत गेले. त्यांचे सहकारी असलेले माझे अनेक जुने मित्र या ना त्या कारणाने कुठे ना कुठे भेटत असत तेंव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये परांजपे सरांचा नेहमी उल्लेख येतच असे. अखेरीस संचालक या पदावरून सेवानिवृत्त होऊन ते कल्याणला सेटल झाले असल्याचे त्यामधून समजले.

त्यालाही जवळ जवळ वीस वर्षे होऊन गेली. कालांतराने माझे ते मित्र आणि मी स्वतः रिटायर होऊन निरनिराळ्या शहरांमध्ये राहू लागलो. आमच्याही गाठी भेटी कमी होत गेल्या आणि झाल्या तरी आता त्यात एसआरपींचा (श्रीराम परांजपे यांचा) विषय निघणे बंद होऊन गेले. ते नाव हळूहळू विस्मरणात जात चालले होते. अचानक लोकसत्तामधल्या एका बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. ती त्यांच्या दुःखद निधनासंबंधीची होती आपली स्मृती मागे ठेऊन ते पुढे चालले गेले होते, आता यानंतर ते आता कधीच प्रत्यक्षात दिसणार नाहीत. 

--------------------------------

Monday, October 07, 2013

तेथे कर माझे जुळती - १६ - स्व. कमलाताई काकोडकर



माझ्या आयुष्यात मला प्रत्यक्ष भेटलेल्या ज्या मोठ्या व्यक्तींच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे त्यांच्याबद्दल या सदरात दोन शब्द लिहायचे असे मी पाच वर्षांपूर्वी ठरवले होते. यातल्या काही व्यक्तीबद्दल लहानमोठे ग्रंथ आणि अगणित लेख लिहिले गेले आहेत. त्या महान लोकांची समग्र माहिती एका लेखात थोडक्यात देणे मला शक्यही नाही, माझी तेवढी पात्रताही नाही आणि हे लेख लिहिण्यामागे माझा तसा उद्देशही नाही. "मी सुध्दा या थोर लोकांना भेटलो आहे." अशी शेखी मारण्याचे माझे वय आता राहिले नाही, पण त्यांना भेटल्याचा मला निश्चितच आनंद आणि अभिमान वाटतो. फक्त माझ्या कांही जुन्या व्यक्तिगत आठवणी आणि या महान लोकांचा माझ्या जीवनावर पडलेला प्रभाव यासंबंधी माझे चार शब्द मी या निमित्याने मांडणार आहे. यामुळे यातसुध्दा कदाचित थोडासा मीच डोकावलेला दिसणार याला काही इलाज नाही. या लेख मालिकेतले हे सोळावे पुष्प प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांच्या मातोश्री स्व.कमलाताई काकोडकर यांना समर्पित करीत आहे. काही दिवसापूर्वी त्यांचे वृध्दापकालाने दुःखद निधन झाले. एक दुर्मीळ असे ध्येयवादी व्यक्तिमत्त्व वर्तमानातून इतिहासात गेले! सध्या सुरू असलेल्या नवरात्राच्या दिवसात आदिशक्तीच्या आधुनिक काळामधील या रूपाचे दर्शन समयोचितच आहे.

डॉ.अनिल काकोडकर आणि मी अणुशक्तीनगर वसाहतीच्या एकाच भागात वर्षानुवर्षे रहात होतो. आमच्या क्वार्टर्स साधारणपणे एकाच प्रकारच्या होत्या, आमची मुले एकाच शाळेत शिकत होती, एकाच डिस्पेन्सरीत आम्ही वैद्यकीय कारणांसाठी जात होतो आणि रोजच्या उपयोगी वस्तू आणण्यासाठी कॉलनीमधल्या एकाच बाजारात जात होतो. इतकेच नव्हे तर आम्हाला कॉलनीच्या बाहेर कुठे जायचे असेल तर त्यासाठी आम्ही एकाच बसस्टॉपवर जात होतो. त्यामुळे अधून मधून कुठे ना कुठे आमची एकमेकांशी गाठ भेट होतच असे. काकोडकरसाहेबांच्या मातोश्री कमलाताई त्यांच्याबरोबर रहात असल्यामुळे त्यासुध्दा नेहमीच्या पहाण्यातल्या होत्या. त्यांच्या वयाचा विचार करता कॉलनीतले सगळेजण त्यांना आजीच म्हणत असत. माझे त्यांच्याशी कधीच फारसे बोलणे झाले नसले तरी माझ्या पत्नीबरोबर ते नेहमी होत असे. कमलाताईंचे वागणे बोलणे अत्यंत साधेपणाचे असायचे. कॉलनीमधल्या त्यांच्या वयाच्या इतर काही आज्या खूप बोलक्या होत्या. आपली मुले, नातवंडे वगैरेंचे कौतुक करतांना त्यांच्या जिभेवर सरस्वती नाचत असे. त्यांच्या किरकोळ कामगिरींचे पुराणसुध्दा त्या रंगवून सांगतांना थकत नसत. पण काकोडकर आजी त्या सर्वांहून फार निराळ्या होत्या. स्वतःची किंवा आपल्या कुटुंबाची बढाई करणे त्यांच्या स्वभावात नव्हते.

खरे पाहता त्यांच्याकडे सांगण्यासारखे खूप म्हणजे खूपच होते. काकोडकरसरांनी अणुशक्तीखात्याच्या प्रशालेत प्रवेश केल्यापासूनच, किंबहुना त्याच्याही आधी इंजिनियरिंग शिकत असतांनापासून नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यांची बुध्दीमत्ता, ज्ञान, कर्तृत्व, संघभावना, कामाबद्दल असलेली तळमळ, निष्ठा हे सगळेच गुण इतके उच्च स्तरावरचे होते की पहिल्या भेटीमध्येच कोणावरही त्यांची छाप पडल्याखेरीज रहात नसे. अणुशक्तीशी निगडित असलेली एकापाठोपाठ एक नवनवी आव्हानात्मक कामगिरी त्यांच्याकडे विश्वासाने सोपवली जात असे आणि ते रात्रंदिवस जिवाचे रान करून ती यशस्वीरीत्या फत्ते करून दाखवत असत. यामधून त्याच्या यशाची कमान सतत उंचावत राहिली आणि त्यांची निवड अधिकाधिक उच्च पदांवर होत गेली. डिपार्टमेंटमध्ये त्यांचे करीयर नेहमीच सुपरफास्ट ट्रॅकवर राहिले होते. काकोडकर आजींना या सर्वाचे मनापासून कौतुक आणि सार्थ अभिमान वाटत असणारच. पण तरीही त्या मितभाषीच राहल्या. मुलाच्या प्रगतीबरोबर कॉलनीमधल्या लोकांच्या मनातले त्यांचे स्थानसुध्दा उंचावत जात होतेच. अधिकाधिक लोक त्यांना जास्त मान देत होते, त्यांच्याकडे अधिक आदराने पाहिले जात होते, पण त्यांनी कधीही त्याचे भांडवल केले नाही. त्यांचे वागणे आणि बोलणे नेहमीच अत्यंत साधेपणाचे राहिले.

त्यांचे स्वतःचे जीवनसुध्दा अद्भुत किंवा कल्पनातीत वाटावे इतक्या वेगळ्या परिस्थितीमधून गेलेले होते, पण त्याबद्दल क्वचितच कुणाला माहिती झाली असेल. आजींच्या बोलण्यात त्याचा उल्लेख त्या बहुधा कधीच करत नसाव्यात किंवा जाणीवपूर्वक मुद्दाम ते टाळत असाव्यात. कॉलनीमधल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांना त्याची पुसटशीसुध्दा कल्पना कधी आली नाही. एक सुसंस्कृत, सुस्वभावी, शांत, प्रेमळ आणि कर्तबगार मध्यमवर्गीय आजी एवढेच त्यांचे व्यक्तीचित्र माझ्या मनात तयार झाले होते. याच्या पलीकडे मला त्यांच्याबद्दल काही माहिती नव्हती. त्यांनी खूप कष्ट सोसून आपल्या मुलांचा सांभाळ केला आणि त्यांना जीवनात इतक्या उंचीवर नेऊन पोचवले वगैरे अस्पष्ट कुणकुण कधी तरी कानावर आली असेल, पण त्याचा जास्त तपशील कधी समजला नव्हता. माझ्या पिढीमधल्या मध्यमवर्गातल्या, विशेषतः ग्रामीण भागातल्या अनेक मुलांनी अनेक अडचणींना सामोरे जाऊन, धडपड करून उच्च शिक्षण घेतले होते आणि त्यात त्यांच्या कुटुंबीयांनीही खस्ता खाल्ल्या होत्या हे सर्वांना माहीत असल्यामुळे कदाचित त्याला त्या वेळी फार मोठे महत्व दिले गेले नसेल.

डॉ.काकोडकर अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष झाल्यानंतर अणुशक्तीनगर सोडून मलबारहिलवरील निवासस्थानी रहायला गेले आणि आजीही तिकडे गेल्यानंतर त्यांचे दर्शन होईनासे झाले. ऑफीसातल्या वाढत्या कामाचे आणि वाढत असलेल्या कुटुंबातले इतर व्यापही वाढत गेल्यामुळे माझ्या स्मरणातून त्या जवळ जवळ बाहेर गेल्या होत्या. कमलाताई काकोडकर यांनी एक आत्मचरित्र लिहिले आहे असे अचानक मला कुणाकडून तरी समजले आणि त्या इतक्या मोठ्या व्यक्ती होत्या हे मला इतके दिवस कसे कळले नव्हते याचे नवल वाटले. त्या पुस्तकाचे नाव त्यांनी एक धागा सुताचा असे का ठेवले आहे याचा काही उलगडा लागत नव्हता.. या पुस्तकाच्या प्रकाशनाशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीकडून ही माहिती मिळाल्यावर मी त्याबद्दल चौकशी केली. ती ऐकून मी केवढा आश्चर्यचकित झालो ते सांगता येणार नाही. या पुस्तकाच्या प्रकाशनसमारंभाला उपस्थित रहाण्याचे भाग्यही मला मिळाले.   

सुप्रसिध्द गांधीवादी नेते कै.दादा धर्माधिकारी यांचे सुपुत्र आणि सुप्रसिध्द निवृत्त न्यायमूर्ती श्री.चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या पुस्तकाचे समारंभपूर्वक प्रकाशन करण्यात आले. त्यांनी खूप वर्षांपूर्वीपासून कमलाताईंना जवळून पाहिले होते. त्या काळातल्या आठवणी त्यांनी सांगितल्या. कमलाताईंचे शिक्षण महात्मा गांधीजींच्या वर्धा येथील सेवाग्राममधील महिलाश्रमात झाले. स्वतः गांधीजी आणि स्व.कस्तुरबा यांचा सहवास त्यांना लाभला आणि देशभक्तीबरोबरच सेवा, संग्राम, सहनशीलता वगैरेंचे जे संस्कार त्या कालावधीत त्यांच्या मनावर बिंबले गेले ते त्यांनी आयुष्यभर जपून ठेवले आणि पुढच्या पिढीला दिले. त्या नेहमी खादीची साधी सुती वस्त्रेच वापरत राहिल्या. सन १९४२च्या चले जाव आंदोलनात त्यांनी भूमिगत होऊन सक्रिय भाग घेतला. त्यांचे पती स्व.पुरुषोत्तम काकोडकर यांना दीर्घकाल पोर्तुगीजांच्या बंदिवासात रहावे लागल्यानंतर कमलाताईंनी मध्यप्रदेशातल्या एका लहानशा गावात आधी शिशुवर्ग सुरू करून ती शाळा वाढवत नेली आणि नावारूपाला आणली. पुढे मुलांच्या शिक्षणासाठी ती सोडून त्या मुंबईत आल्या आणि खादी ग्रामोद्योग केंद्रात काम करत राहिल्या. ज्या काळातल्या सर्वसामान्य स्त्रिया कोणाच्या सोबतीशिवाय घराचा उंबरठासुध्दा ओलांडायला घाबरत असत त्या कालखंडातला हा कमलाताईंचा खडतर जीवनप्रवास त्यांनी ज्या धैर्याने आणि जिद्दीने केला त्याला तोड नाही. कमलाताईंच्या आयुष्याचा धागा उलगडताना स्त्री जन्माची एक वेगळीच कहाणी पाहायला मिळाल्याचे चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. त्या काळातील मोठ्या माणसांच्या सहवासानंतर आताची माणसे पिग्मी वाटतात, अशी खंतही त्यांनी त्या प्रसंगी व्यक्त केली होती.

स्वत: कमलाताईंनी त्यांच्या जीवनाचा हा एक धागा सुखाचा नसून सुताचा का हे सांगताना जीवनातील चरख्याचे माहात्म्य सांगितले. स्वराज्याचा सूर्य उगवला, पण सुराज्य आले नाही, नवकोट नारायण भरपूर झाले पण गरीब माणसाचे भले झाले नाही, अशी खंत व्यक्त करतानाच कमलाताईंनी आम्ही कसे जगलो याविषयी येणाऱ्या पिढीला प्रश्न् पडू नयेत म्हणून हे पुस्तक लिहिल्याचे सांगितले. स्वातंत्र्य ते आणीबाणी, आणीबाणी ते टेलिकॉम क्रांती, टेलिकॉम क्रांती ते आजचे जागतिकीकरण असा सगळा प्रवास सजगपणे करणारी आणि त्याविषयी कसोशीने बोलण्याची इच्छा असणारी व्यक्ती म्हणजे कमलाताई असल्याचे पुस्तकाचे शब्दांकन करणारे पत्रकार चंदशेखर कुलकर्णी यांनी सांगितले. वयोमानानुसार स्वतः सगळे लिहून काढणे कदाचित कमलाताईंना आता अवघड झाले असल्यामुळे त्यांनी सांगितलेल्या हकीकती कुलकर्णी यांनी व्यवस्थितपणे लिहून दिल्या असाव्यात.

डॉ.अंजली कुलकर्णी आणि डॉ.अनुराधा हरकरे या दोन भगिनींनी मिळून फुलाला सुगंध मातीचा या नावाचे एक सुरेख पुस्तक लिहिले आहे. यात निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये शिखरावर जाऊन पोचलेल्या पाच प्रसिध्द व्यक्तींच्या जडणघडणीवर त्यांच्या मातापित्यांचा, विशेषतः त्यांच्या आईचा किती प्रभाव पडला होता हे या पुस्तकात त्यांनी दाखवून दिले आहे. यासाठी त्यांनी या पालकांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि या मुलाखतींमधून त्यांचे आगळे वेगळे व्यक्तीमत्व दिसून येते. या पुस्तकातला पहिलाच लेख स्व.कमलाताई आणि डॉ.अनिल काकोडकर यांच्यावर आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनसोहळ्यालाही मी उपस्थित राहिलो होतो. या पुस्तकाच्या लेखिकांना मुलाखत देतांना काकोडकर आजींनी सांगितले होते, "प्रत्येक आईला आपलं मूल खूप मोठं व्हावं, यशस्वी व्हावं असं वाटतं. परंतु त्यासाठी योग्यरीत्या पालकत्व निभावणं आवश्यक असतं. पालकांनी मुलांसमोर आदर्श ठेवणं, गरज पडल्यास स्वतःवरही वागणुकीची बंधनं घालणं गरजेचं असतं ..."  त्यांनी तरुण पिढीला असा संदेश दिला आहे, "रोज एक तरी काम स्वतःच्या कुटुंबासाठी सोडून दुस-या कुणासाठी तरी करून बघा, प्रत्येकाने असे ठरवले तर आपल्यासोबत दुस-याचा, पर्यायाने हळूहळू देशाचा विकास होईल."

दुनिया गोल आहे. यामुळे आपल्याला कोण कुठे आणि केंव्हा अकल्पितपणे भेटेल हे सांगता येणार नाही. माझ्या मुलाचे लग्न झाल्यानंतर काही काळाने आम्हाला समजले की आमच्या सुनेच्या आईचे (मंगलाताईंचे) माहेर खरगोणला कमलाताई काकोडकरांच्या घराजवळ होते आणि त्यांनी म्हणजे आमच्या विहीणबाईंनी त्यांच्या लहानपणी काकोडकर आजींना खूप जवळून पाहिले होते. तेंव्हाच त्या गोष्टीला निदान वीस पंचवीस वर्षे उलटून गेली होती, पण त्याचा तपशील त्यांच्या चांगला लक्षात होता. ही गोष्ट आम्ही आजींना भेटल्यावर सांगितली तेंव्हा त्यांनाही ही जुनी ओळख लगेच आठवली. त्यानंतर जेंव्हा जेंव्हा आमची भेट झाली तेंव्हा त्यांनी "आमची मंगला कशी आहे.." याची जरूर चौकशी केली. दोन तीन वर्षांपूर्वी आम्ही आमच्या दूरच्या नात्यातल्या एका मुलीच्या लग्नाला ठाण्याला गेलो होतो, तिथे काकोडकर आजी सौ.काकोडकरांना घेऊन आल्या होत्या. त्या दोघी नव-या मुलाकडच्या बाजूने आल्या होत्या. आपण कोणी व्हीआयपी आहोत असा कसलाही आभास त्यांच्या वागण्यात नव्हता. ही गोष्ट आधीपासून ठाऊक नसली तर कुणाला तसे मुळीसुध्दा वाटले नसते. भोजन संपल्यावर त्यांनी आम्हाला थोडा वेळ जवळ बसवून घेतले, अत्यंत आपुलकीने आमची चौकशी केली. तिथून आम्हाला ठाण्यातच दुस-या एका आप्तांना भेटायला जायचे होते हे आमच्या बोलण्यात येऊन गेल्यावर त्या घरी परत जातांना वाटेत आम्हालाही त्यांच्या गाडीने सोडतील अशी नुसती ऑफर दिली नाही तर आम्ही ती स्वीकारावी असा प्रेमळ आग्रह केला. पण ठाण्यातले त्यांचे घर आणि आम्हाला जायचे असल्याची जागा मंगल कार्यालयाच्या भिन्न दिशांना आहेत आणि दिवसा उजेडी आम्हाला तिथे रिक्शेने जायला कसलाही त्रास नाही वगैरे सांगून कसेबसे त्यांना ते पटवून दिले. दुस-यासाठी शक्यतो काही तरी करायला हवे असा त्यांनी नुसता संदेश दिला नव्हता, अखेरपर्यंत त्या स्वतः तसा विचार आणि आचरण करीत होत्या हे अशा छोट्या उदाहरणातून सहज लक्षात येते..

ती भेटच आमची काकोडकर आजींबरोबर झालेली अखेरची भेट ठरली. मागच्या महिन्यात त्यांची प्राणज्योत मालवल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचली आणि क्षणभर मन सुन्न होऊन गेले. स्त्रीला आदिशक्तीचे रूप का म्हणतात याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे स्व.कमलाताई काकोडकर. आम्हाला ते पहायला मिळाले, त्यांच्याकडून प्रेमाचे चार शब्द आणि शब्दाविना मिळालेली अदम्य स्फूर्ती, जीवन कसे जगावे याचा न सांगता आपल्या आचरणामधून दिलेला वस्तुपाठ मिळाला हे आमचे भाग्य.

Saturday, October 05, 2013

घटाघटाचे रूप आगळे

घटाघटाचे रूप आगळे। प्रत्येकाचे दैव वेगळे।
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार ।।

असे कवीवर्य स्व.ग.दि.माडगूळकरांनी लिहिले आहे. पन्नास वर्षांपूर्वीच्या ग्रामीण महाराष्ट्रामधील जीवनावरील या गीतात अगदी चपखलपणे बसणारी ही उदाहरणे आहेत. श्रीकृष्णाच्या गोकुळामधल्या गोपिकांपासून ते माझ्या आधीच्या पिढीमधल्या काळातल्या खेड्यांमध्ये राहणा-या घराघरातल्या गृहीणींपर्यंत सगळ्याजणी आपापल्या घरांमधले दूध, दही, लोणी वगैरे खाद्यपेय पदार्थ मातीच्या गाडग्यामडक्यांमध्ये ठेवत असत. त्या काळात स्टेनलेसस्टीलची भांडी अजून निघालेली नव्हती, काचेच्या किंवा चिनी मातीच्या पात्रांची किंमत परवडत नसे आणि त्या वस्तू खेडेगावातल्या बाजारात मिळत नसल्यामुळे मुद्दाम बाहेरून आणाव्या लागायच्या. त्या मानाने स्थानिक कुंभाराने तयार केलेली मातीची मडकी, घडे वगैरे स्वस्त आणि सहज उपलब्ध होत असत. ती फुटली तरी त्याची फारशी हळहळ वाटायची नाही. मोठे तोंड असलेली अनेक लहानमोठी मडकी घरात आणून रचून ठेवलेली असत. गरजेप्रमाणे त्यातले एक एक काढून घेऊन त्यात दूध, दही, लोणी वगैरे ठेवले जात असे. घरातला सगळा स्वयंपाक चुलींवर होत असल्यामुळे तो झाल्यानंतर चुलींमधले धगधगते निखारे वेगळ्या मडक्यात काढून ठेवले जात असत आणि तळाशी पडलेली राख वेगळी ठेवली जात असे. निखारे थंड केल्यानंतर त्याचा कोळसा पुन्हा ज्वलनासाठी वापरला जाई आणि राखेचा उपयोग भांडी घासण्यासाठी होत असे. एका चुलीतले निखारे बाहेर काढून त्यांचा उपयोग दुसरी चूल, शेगडी किंवा बंब पेटवण्यासाठी केला जात असे. अशा वेळी त्यांना इकडून तिकडे घेऊन जाण्यासाठी मातीच्याच उथळ पात्रांमध्येच ठेवले जात असे.

शहरात वाढलेल्या पुढच्या पिढीतल्या मुलांना फ्रीजमधून काढून खायचे अमूल बटरच ओळखीचे झाले असणार. मोठ्या डे-यामध्ये रवीने ताक घुसळून काढलेला ताज्या लोण्याचा गोळा त्यांना क्वचितच पहायला मिळाला असेल आणि त्या छान लोण्याच्या गोळ्याला मातीच्या मडक्यात घालून ठेवण्याची कल्पनासुध्दा कदाचित सहन होत नसेल. गॅस, ओव्हन किंवा इलेक्ट्रिक हॉटप्लेटवरच घरातला स्वयंपाक होत असल्यामुळे निखारा किंवा अंगार हे शब्दसुध्दा त्यांच्या कानावर पडले असण्याची शक्यताही कमीच आहे. कुंभाराने तयार केलेल्या एका मडक्याला लोण्याची स्निग्धता आणि मऊपणा अनुभवायला मिळतो तर तशाच प्रकारच्या दुस-या मडक्याला मात्र निखा-याचे दाहक चटके सहन करावे लागतात, हे ज्याचे त्याचे नशीब आहे हे या ओळींमधून सांगितलेले सत्य किती विदारक आहे याची पूर्ण जाणीव त्यांना कदाचित होणार नाही. त्यासाठी दुसरी उदाहरणे द्यावी लागतील.

गदिमांच्या गीतातले घट या जगातल्या माणसांची प्रतीके आहेत हे उघड आहे. मातीची सगळी मडकी कुंभारांकडून एक एक करूनच बनवली जातात, अजून तरी त्याचे यांत्रिक साचे निघालेले नाहीत. त्यामुळे ती एकासारखी एक दिसत असली तरी त्यांचा आकार, गोलाई. कडांची जाडी यात थोडा थोडा फरक असतोच. पंजाब, बंगाल, महाराष्ट्र, तामीळनाडू, किंवा जर्मनी, चीन, आफ्रिका वगैरे भागातली माणसे त्यांच्या वंशानुसार साधारणपणे सारखी दिसली तरी त्यातल्या प्रत्येकाचा चेहेरा वेगळा असतो. त्याचप्रमाणे उतरंडीमधले प्रत्येक मडके वेगळे आहे हे त्यांना निरखून पाहिल्यास समजेल. निरनिराळ्या घटाचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातोच. वर दिल्याप्रमाणे काही मडक्यांमध्ये लोणी आणि कांहींमध्ये अंगार ठेवला जातोच, काही मडकी तर अंत्यविधीच्या वेळी फक्त काही मिनिटांसाठीच वापरली गेल्यावर लगेच फोडून टाकली जातात. याच्या उलट हजार दोन हजार वर्षांपूर्वी तयार केले गेलेले काही सुबक नक्षीकाम केलेले रांजण आपल्याला पुरातनवस्तूसंग्रहालयांमध्ये (म्यूजियम्समध्ये) आजही पहायला मिळतात. जगभरातले रसिक पर्यटक त्यांना पाहण्यासाठी येतात आणि त्या रांजणांची व त्यांना बनवणा-या कारागीरांची तोंड भरून तारीफ करतात. त्यातल्या काही रांजणांमध्ये एका काळी सुवर्णमुद्रा भरून ठेवल्या गेल्या असतील आणि प्राणपणाने त्यांचे संरक्षण करणारे सैनिक त्यांच्या पहा-यावर ठेवले जात असतील.

निरनिराळ्या घटांमधल्या कशाचा उपयोग कोणत्या कामासाठी व्हावा हे ठरवण्याचा काडीमात्र अधिकार त्या पात्रांना नसतो. या बातीत काहीही करायला ती असमर्थ असतात. माणसे त्यामानाने थोडी सुदैवी असतात. माणसाचे आयुष्यसुध्दा सर्वस्वी त्याच्या नशीबावर अवलंबून असते असे गदिमांच्या गीतात ध्वनित होत असले तरी याबाबतीत माझी मते थोडी वेगळी आहेत. मी इतका सर्वस्वी दैववादी नाही. निदान काही प्रमाणात तरी माणूस स्वतःच्या प्रयत्नाने आपली वर्तमानकाळातली परिस्थिती बदलून आपले भविष्य घडवू शकतो. सर्वच बाबतीत ते शक्य होणार नसले तरी काही प्रमाणात तो यशस्वी होऊ शकतो, नशीबाने आलेल्या परिस्थितीमुळे निर्माण झालेले मनातले रागद्वेशाचे निखारे फेकून देऊन त्यांच्या जागी सुंदर, मोहक आणि कोमल भावनांची फुले गोळा करून ठेऊ शकतो, हे करता करता इतरांच्या प्रेमाचा किंवा मायेचा लोण्याचा गोळासुध्दा त्याला मिळू शकतो.

हे सगळे मला आज कां आठवले असेल? सकाळी उठून फिरायला जायला निघालो आणि शेजारी असलेल्या महात्मा गांधी कॉम्प्लेक्सपर्यंत गेलो तर तिथे कोप-यावर बरीच गर्दी जमलेली दिसली. जवळ जाऊन पाहिले तर सुंदर सजवलेल्या मटक्यांचे ढीग रचून ठेवलेले होते आणि त्या भागातल्या कोकिळाबेन, ऊर्मिलाबेन वगैरे शेठाण्या, त्यांच्या सेजल, हेतल वगैरे सुना आणि चिंकी, डिंकी वगैरे मुलींना सोबत घेऊन त्याला गराडा घालून उभ्या होत्या. एक एक घट निरखून पहात होत्या, त्यांचे आकार, त्यावर रंगवलेली नक्षी, कांचांच्या तुकड्यांना चिकटवून केलेली डिझाईन्स वगैरे पाहून पसंत केलेल्या मडक्याच्या भावावरून घासाघीस करत होत्या. या सगळ्या घटाघटांचे रूप आगळे वेगळे असले तरी त्या सर्वांचे दैव मात्र साधारणपणे सारखेच असावे. त्या सगळ्यांची आज छान पूजा केली गेली असेल, नऊ दिवस त्यांच्या सभोवती रासगरबा खेळला जाईल. त्यासाठी तयार केलेली खास गाणी लाऊडस्पीकरवर जोरजोरात वाजवली जातील, रंगीबंरंगी कपडे आणि अलंकार लेऊन सजलेल्या युवती प्रचंड उत्साहाने आणि बेभान होऊन त्या गाण्यांच्या तालावर नाचतील. त्यांची यात सतत चढाओढ होत राहील. या घटांना (ते सजीव नसतात, पण असले तर) ती सगळी मौजमजा पहायला मिळेल आणि .... नऊ दिवसांनंतर ते सगळे संपुष्टात आल्यानंतर त्यांना कोणीही विचारणार नाही, बहुधा त्यांचे आयुष्यही तिथेच संपेल, पण नऊ दिवसांचेच त्यांचे आयुष्य मात्र दिमाखात जाईल.