Monday, November 26, 2018

माझी डिजिटल दिवाळी



माझ्या लहानपणी दिवाळी म्हणजे अपरंपार महत्वाचा सण असायचा. त्या चारपाच दिवसांमधली खाद्यंति, नवे कपडे, दिवे, रांगोळ्या, फटाके, पाहुण्यांची गर्दी वगैरे सगळे काही जन्मभर लक्षात राहिले आहे. याचे कारण म्हणजे ते नेहमीपेक्षा खूपच वेगळे असायचे. त्या रेशनिंगच्या काळात रोजच्या आहारातली धान्येसुद्धा खुल्या बाजारात मिळायची नाहीत. रेशनच्या दुकानात जे आणि जेवढे धान्यधुन्य मिळेल तेच शिजवायचे आणि एकाद्या कालवणाबरोबर पोटात ढकलून भूक भागवायची अशी परिस्थिती होती. फक्त सणावाराच्या दिवशीच थोडे गोडधोड खायला मिळायचे. त्यामुळे दिवाळीतले चार दिवस रोज निरनिराळी पक्वान्ने आणि शिवाय इतर वेळी फराळाचे चविष्ट पदार्थ खाणे म्हणजे प्रचंड चंगळ होती. त्या काळात एरवी रोज जुनेच कपडे धुवून वापरायचे, उसवले तर शिवण मारून आणि फाटले तर ठिगळ लावून त्यांचे आयुष्यमान वाढवत रहायचे आणि मोठ्या भावाचे कपडे त्याला लहान व्हायला लागल्यावर ते लहान भावाने घालायचे अशीच रीत होती.  दर वर्षी दिवाळीत मात्र नवे कपडे मिळत असल्यामुळे त्यांचे मोठेच अप्रूप वाटायचे.

आजकाल आपण सगळ्या प्रकारच्या मराठी पदार्थांशिवाय काश्मीरी राजमा ते दाक्षिणात्य डोसे, गुजराथी उंधियो ते बंगाली रोशगुल्ले, एवढेच नव्हे तर चिनी मांचूरिया ते इटालियन पिझ्झापर्यंत असंख्य खाद्यपदार्थ नेहमीच हॉटेलात जाऊन खातो किंवा ते घरबसल्या खायला मिळतात, कुठलेसे बंधू किंवा राम यांच्या नावांच्या खाद्यपदार्थांची पुडकी कपाटांमध्ये आणि डबे फ्रिजमध्ये पडलेले असतात. आपल्याला इच्छा होईल त्या क्षणी आपण गोड किंवा तिखटमिठाचा एकादा पदार्थ चाखू शकतो. त्यांच्या या वाढलेल्या उपलब्धतेमुळे आता दिवाळीतल्या खाण्याचे विशेष महत्वच वाटेनासे झाले आहे. त्याचप्रमाणे आपण नेहमीच भरमसाट कपडे खरेदी करत असतो आणि कृत्रिम धाग्यांचे आजकालचे कापड आटत नाही, विटत नाही की फाटत नाही आणि ते वर्षानुवर्षे नवे कोरेच दिसते. तरीसुद्धा दिवाळीला नेमाने नवे कपडे घेतो पण त्यापासून लहानपणी वाटायचा तेवढा आनंद मात्र आता मिळत नाही.

शिक्षण आणि नोकरीसाठी परगावी रहात असलेली आमच्या एकत्र कुटुंबातली झाडून सगळी मंडळी माझ्या लहानपणी दिवाळीला सहकुटुंब घरी जमायचीच. त्यांच्या आगमनाने आमचा वाडा एकदम गजबजून जात असे. त्यात लहान बाळांपासून वृद्धांपर्यंत सगळ्या वयोगटातले लोक असायचे. मग गप्पागोष्टी, थट्टामस्करी, हास्यविनोद, गाणी, नकला, पत्ते आणि सोंगट्यांचे डाव वगैरेंमध्ये सगळा दिवस तर धमाल यायचीच, रात्रीसुद्धा गच्चीवर अंथरुणे पसरून त्यात दाटीवाटीने पडल्यापडल्या गप्पांचे फड खूप रंगायचे. लहानपणाबरोबरच हा अद्भुत अनुभव मात्र संपून गेला. पुढील काळात सारी भावंडे एक दोन खोल्यांच्या लहान लहान घरांमध्ये देशभर विखुरली आणि सर्वांना एकत्र आणण्यासाठी दिवाळीचे आकर्षण पुरेसे सशक्त राहिले नाही. मी मुंबईत असतांना दिवाळीमध्ये तिथल्या भावाकडे किंवा बहिणीकडे आवर्जून जात असे आणि एकादा दिवस ते माझ्याकडे येत असत. पुण्यामधली आप्त मंडळीसुद्धा दिवाळीतल्या एका दिवशी एकत्र जमत असत, पण हळूहळू हे भेटणेसुद्धा कमी होत गेले.

गेल्या काही वर्षांपासून आंतर्जाल (इंटरनेट) आणि दूरध्वनि (टेलीफोन) यांच्या माध्यमामधून मात्र जगभर पसरलेली आपली माणसे एकमेकांना जोडली गेली आहेत. पाहिजे तेंव्हा आपण त्यांच्याशी बोलू शकतो आणि त्यांना पिटुकल्या पडद्यावर डोळ्यांनी पाहू शकतो किंवा त्यांना समोर पाहता पाहता त्यांच्याशी बोलूही शकतो. वॉट्सअॅपवर सतत काही ना काही संदेशांची देवाणघेवाण चाललेली असते. त्यामुळे ते लोक इतके दुरावल्यासारखे वाटत नाहीत. या डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे काही जुने आणि आधी दुरावलेले मित्र किंवा आप्तसुद्धा आता आपल्या संपर्कक्षेत्रात आले आहेत. 

या वर्षी दिवाळीला माझी नातवंडे त्यांच्या आईबरोबर 'मामाच्या गावाला' गेली होती. मुलाला ऑफिसमध्ये अत्यंत आवश्यक असे काम असल्यामुळे तो इथेच थांबला होता, पण घरी असतांनासुद्धा बहुतेक वेळ तो त्याच्या कँप्यूटरमध्ये डोके खुपसून आणि फोनवर कुणा सहकाऱ्याशी किंवा क्लायंटशी बोलत बसलेला असे. त्यामुळे 'मै और मेरी तनहाई' तेवढे एकमेकांना सोबत करत होतो पण इंटरनेटमधून अख्खी डिजिटल दुनिया मला भेटत होती आणि माझ्याशी बोलत होती. त्यातली काही माणसे खरीखुरी आणि आमच्या जवळची होती, तर काही मला या आभासी दुनियेत भेटलेली होती, त्यांनी आपला जो मुखवटा ठरवून दाखवला होता तेवढाच मला माहीत होता.



या दुनियेमध्येसुद्धा मोठ्या धूमधडाक्याने दिवाळी साजरी होत होती. अगदी वसुबारसेपासून ते भाऊबीजेपर्यंत प्रत्येक दिवसाची व्यवस्थित सविस्तर सचित्र माहिती एका पाठोपाठ एक पहायला आणि वाचायला मिळत होती. वसुबारसेला कुठल्याही गोठ्यात न जाता मला सवत्स धेनूंचे दर्शन घडले. गाईच्या पोटात ३३ कोटी देव असतात म्हणे. एका शिल्पाच्या छायाचित्रात प्रतीकात्मक रीतीने गायीच्या पोटातले अनेक देव दाखवले आहेत. धनत्रयोदशीला समुद्रमंथनामधून धन्वंतरी प्रकट झाले म्हणून त्या दिवशी त्याचीही पूजा करतात हे मला माहीत नव्हते. तसेच दिवाळीत देवांचा खजिनदार कुबेर याचीही पूजा करतात म्हणे. देवादिकांनासुद्धा आजार होत असतील का? ते झाले तर धन्वंतरी आणि अश्विनीकुमार त्यांच्यावर कसले उपचार करत असतील? कुबेराकडे देवांचा कुठला खजिना असायचा? त्यात कुठले धन ठेवले असायचे? ते धन तो कुठे ठेवत असेल आणि त्याचा विनियोग कोण, केंव्हा आणि कसा करत असेल? असले प्रश्न मात्र कुणालाच पडत नाहीत. नरकचतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराला मारले असे मी लहानपणापासून ऐकत होतो, पण त्या दिवशी कालीमातेनेसुद्धा एकाद्या असुराला मारले असावे. मला आलेल्या एका शुभेच्छापत्रावर दिलेल्या चित्रात तसे दाखवले आहे तर दुसऱ्या चित्रात साक्षात शंकरालाच कालीच्या पायाशी दाखवले आहे. त्याचा उलगडा होत नाही.  श्रीकृष्णाचे नरकासुराला मारतांनाचे चित्र मात्र कुठे दिसले नाही.

अमावास्येच्या रात्री सगळीकडेच भक्तीभावाने लक्ष्मीपूजन आणि दिव्यांची जास्तीत जास्त आरास करतात, त्याच्यापाठोपाठ फटाक्यांचा धुमाकूळ सुरू होतो आणि बराच वेळ चालतो. आजकाल वायूप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषणाचा विचार करून यावर अंकुश लावण्यासाठी बराच प्रचार होत असतो. या वर्षी निदान पुण्यात तरी त्याचा थोडा परिणाम झाला असावा असे वाटले. आमच्या भागात या वर्षी मी पहिल्यांदाच रहात होतो, पण आतापर्यंत इतर ठिकाणी जो कानठळ्या बसवणारा आवाज कानावर यायचा तसा या वर्षी इथे आला नाही. पाडव्याच्या दिवशी बालश्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत तोलून धरला होता आणि त्याच्या छताखाली सर्व गोकुळाचे पावसापासून रक्षण केले होते. त्या घटनेनिमित्य या दिवशी उत्तर भारतात गोवर्धनपूजा करतात ही एक नवी माहिती समजली. कार्तिक शुद्ध द्वितियेला म्हणजे आपल्याकडल्या भाऊबीजेच्या दिवशी उत्तर भारतातले काही लोक चित्रगुप्त महाराजांची पूजा करतात हे आणखी एक नवे ज्ञान मला या वर्षी मिळाले.



दिवाळीच्या दिवसांमध्ये माझ्या डिजिटल विश्वातल्या मित्रांनी (यात नातेवाईकांचाही समावेश होतो) असंख्य शुभकामनासंदेश (ग्रीटिंग्ज) तर पाठवलेच, त्यानिमित्य अनेक अफलातून विशेष लेख आणि कविताही फेसबुक आणि वॉट्सअॅपवर पाठवून दिल्या. काही लोकांनी शास्त्रीय संगीताचे आणि एका मित्राने खास दिवाळीवरील अनेक मराठी गाण्यांचे रेकॉर्डिंग पाठवले. शिवाय टेलिव्हिजनवर रोज सकाळी दिवाळीपहाटेचे विशेष कार्यक्रम दाखवले जात होतेच, इतरही काही ना काही खास कार्यक्रम असायचे. रोजच्या डेली सोप म्हणजे नेहमीच्या मालिकांमधल्या कुटुंबांमध्येसुद्धा दिवाळीमधला प्रत्येक दिवस अगदी साग्रसंगीत साजरा होतांना दिसत होता. अंगाला तेल लावून मालिश करणे, तबकात निरांजन आणि सुपारी ठेऊन आणि ओवाळून औक्षण करणे, सर्वांनी मिळून हास्यविनोद करत फराळ करणे वगैरे तपशीलासह दिवाळीतले घरगुती प्रसंग इतके हुबेहूब चित्रित केले होते की ते माझ्या आजूबाजूलाच घडत असल्याचे वातावरण निर्माण करत होते. गंमत म्हणजे खरी दिवाळी संपून गेली तरी यांची दिवाळी आणखी २-३ दिवस हळूहळू चाललेलीच होती.

माझ्या काही आप्तांनीसुद्धा आपल्या पोस्टमध्ये तो सण कुणीकुणी कसा साजरा केला यांची अनेक छायाचित्रे (फोटो) आणि चलतचित्रे (व्हीडिओ) पाठवली होती. त्यात फराळाचे पदार्थ, किल्ले, फुलबाज्या, ओवाळण्याचे कार्यक्रम वगैरे सगळे काही छान दाखवले होते. ती चित्रे पाहतांना मीसुद्धा मनाने त्यांच्या उत्साहात सहभागी होत होतो. त्याशिवाय रोज सकाळसंध्याकाळी टेलीफोन आणि व्हीडिओ कॉल्स होत होतेच.

मी कॉलेजशिक्षणासाठी आणि नोकरीसाठी घरापासून दूर रहात असतांनासुद्धा दरवर्षी दिवाळीला मात्र नेमाने घरी जात असे. दिवाळीच्या दिवशी एकट्याने घरात बसून राहण्याचा हा माझ्या आयुष्यातला पहिलाच अनुभव होता. पण मी एकटा कुठे होतो? "लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी। भाग्य घेऊनिया आली आज धनत्रयोदशी॥" असे म्हणत प्रत्यक्ष माणिक वर्मांनी माझ्या दिवाळीची सुरुवात करून दिली होती. साक्षात बिस्मिल्लाखानांच्या सुस्वर अशा शहनाईवादनाने माझी मंगलप्रभात सुरू होत होती. त्यानंतर पं.भीमसेनअण्णा आणि कुमारजी वगैरे थोर दिवंगत मंडळींपासून ते राहुल आणि कौशिकीपर्यंत आताची तरुण गायक मंडळी यांची शास्त्रीय संगीताची मेजवानी मिळत होती. शिवाय लतादीदी, आशाताई, रफी, मुकेश, किशोर वगैरेंची तर विविध प्रकारची हजारो सुरेल गीते साथीला होतीच. संगीत ऐकून झाले असेल तर वाचण्यासाठी अनेक विनोदी किंवा माहितीपूर्ण पोस्टांचा प्रवाह या सोशल मीडियावर अखंड वहात होता. त्यांच्याहीपेक्षा मजेदार अशी चित्रे, चलचित्रे आणि व्यंगचित्रे छान मनोरंजन करत होती. लिहायचा मूड आला तर माझे स्वतःचे ब्लॉग होतेच, फेसबुकवरही लिहिण्याची सोय होती. फेसबुक आणि वॉट्सअॅपवरील मित्र त्यावर 'आवडले' (लाईक)चे शिक्के मारून उत्साह वाढवत होते किंवा काही वेळा आपले शेरे मारत होते, तसेच मी इतरांच्या लेखनावर करत होतो. त्यावर मग उत्तरप्रत्युत्तरांच्या फैरी झडत होत्या आणि या विषयावर आपली मते भिन्न असल्यामुळे "वुई अॅग्री टु डिसअॅग्री"वर जाऊन त्या थांबत होत्या. हे सगळे एरवीसुद्धा चालतच असते. दिवाळीमुळे त्यात खंड पडला नव्हता. या सर्वांच्या साथीमुळे मला केंव्हाच एकटा पडल्यासारखे वाटलेच नाही.

तेंव्हा अशा रीतीने साजरी झालेली ही माझी पहिली डिजिटल दिवाळीसुद्धा मला आनंदाचे दोनचार क्षण देऊनच गेली.  या वर्षी मला आलेल्या आणि आवडलेल्या खास संदेशांचा एक संग्रह करून मी तो या ठिकाणी जपून ठेवला आहे.
https://anandghare.wordpress.com/2018/11/13/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE/

Friday, November 09, 2018

माझा चित्रांचा संग्रह - १ - दीपांचा इतिहास

मी नोकरीत असतांना शेवटी शेवटी माझ्यावर इतकी जबाबदारीची कामे पडली होती की त्यातून माझ्या वैयक्तिक कामासाठीच वेळ मिळत नव्हता, मग फावल्या वेळातले छंद कसे जोपासणार? पण त्याच काळात माझा जनसंपर्क अपार वाढल्यामुळे मला मिळणारी आमंत्रणपत्रे आणि ग्रीटिंग कार्ड्स यांची संख्या शिगेला पोचली होती. सेवानिवृत्त झाल्यानंतर ती शांतपणे पहावीत असा विचार करून मी ती टाकून न देता मी ढिगारा करून बाजूला ठेऊन दिली होती.  पण प्रत्यक्षात सेवेमधून मुक्त झाल्यानंतर आणखी अनेक अडचणी येत गेल्या आणि तो अव्यवस्थित ढिगारा वाढत गेला.

अशा प्रकारे माझ्याकडे गोळा होत असलेल्या असंख्य चित्रांना व्यवस्थित मांडून ठेवण्यासाठी त्यांची कशा रीतीने वाटणी करायची याचा मी विचार करत होतो. त्यात एकदा मला 'दिव्यांचा इतिहास' या विषयावरचा लेख मिळाला. तो वाचल्यावर मला एक कल्पना सुचली आणि माझ्याकडे असलेल्या दिव्याच्या सगळ्या चित्रांना एका डायरीत चिकटवून ठेवले. माझ्या संग्रहांबद्दल लिहितांना दीपावलीची वेळ साधून या संग्रहापासून सुरुवात करायची होती, पण त्यातही नकटीच्या लग्नासारखी सतराशे तांत्रिक विघ्ने आली. अखेरीस हे प्रेझेंटेशन ज्या स्थितीत होते तसेच आधी दाखवून टाकले. आणि नंतर फुरसतीने त्याचे थोडे थोडे संपादन केले.

एक चित्र म्हणजे हजार शब्दांच्या तोडीचे असते असे म्हणतात. आता मी इतके शब्द कुठून आणणार? त्यापेक्षा चित्रेच दाखवलेली बरी. माझ्या संग्रहातील बऱ्याचशा चित्रांचे फोटो काढून ते सहा चौकटींमध्ये चिकटवले आणि या लेखात खाली दिले आहेत. साध्या मातीच्या पणतीपासून नक्षीदार टांगलेल्या दिव्यांपर्यंत प्रगत होत गेलेल्या दिव्यांची अनेक रूपे माझ्या या संग्रहामध्ये पहायला मिळतील.

आदिमानवाने अग्नीचा शोध लावल्यानंतर त्याचेपासून ऊष्णता आणि प्रकाश या दोन्ही गोष्टी मिळवणे सुरू केले. शेकोटी, चूल, शेगडी, भट्टी अशा साधनांमधून उष्णता प्राप्त केली तर पणती, निरांजन, समई वगैरे दिव्यांमधून उजेड मिळवला. त्यामध्ये होत गेलेल्या सुधारणा  कवि वि.म.कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आणि मी शाळेत शिकलेल्या एका कवितेत इतक्या छान दाखवल्या होत्या!

आधी होते मी दिवटी, शेतकऱ्यांची आवडती । 
झाले इवली मग पणती,घराघरांतून मिणमिणती। 
समई केले मला कुणी, देवापुढती नेवोनी । 
निघुनी आले बाहेर, सोडीत काळासा धूर।
काचेचा मग महाल तो, कुणी बांधुनी मज देतो । 
कंदील त्याला जन म्हणती, मीच तयांतिल परि ज्योती। 
बत्तीचे ते रूप नवे, पुढे मिळाले मज बरवे। 
वरात मजवाचून अडे, झगमगाट तो कसा पडे। 
आता झाले मी बिजली, घरे, मंदिरे लखलखली । 
देवा ठाऊक काय पुढे, नवा बदल माझ्यात घडे। 
एकच ठावे काम मला, प्रकाश द्यावा सकलांला । 
कसलेही मज रूप मिळो, देह जळो अन्‌ जग उजळो।

बिजली या एका शब्दात सांगितलेल्या दिव्यांची पुढे ट्यूबलाइट, निऑन, सोडियम व्हेपर आणि आता एलीडी पर्यंत अनेक रूपे येत गेली आहेत. पण केरोसीन, पेट्रोल किंवा वीज यांनी उजळणाऱ्या दिव्यांचा समावेश या संग्रहात केलेला नाही.


प्राचीन काळातल्या माणसाने दिव्यांसाठी खोलगट दगड, शिंप, नारळाची करवंटी यांचा उपयोग केला असावा, असे अश्मयुगामधील अवशेषांमधून दिसते, पण त्याने त्यात घालण्यासाठी तेल आणि वात कुठून आणली याचा पूर्ण उलगडा होत नाही. मातीची भांडी घडवताना त्यानं पणती घडवली. धातूंचे शोध लागल्यानंतर तांब्यापितळेचे दिवे तयार झाले. श्रीमंत लोकांनी चांदीचे आणि अतीश्रीमंत लोकांनी सोन्यापासूनही दिवे बनवून घेतले. मातीची पणती आणि धातूंचे दिवे या दोन्ही प्रकारांमध्ये कला आणि कौशल्य या दोन्हींचा विकास होऊन त्यांचे निरनिराळे आकार तयार केले गेले. त्यात निसर्गामधील पाने, फुले, पक्षी, प्राणी वगैरे होते तसेच कलाकाराच्या कल्पनेमधून तयार झालेले आकारही होते. "इतिहास भारतीय दीपोंका" या लेखाबरोबर दिलेल्या चित्रांमध्ये हे दाखवले आहेत.


भारतीय संस्कृतीमध्ये दीपकाला फार महत्वाचे स्थान आहे. प्रत्येक धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रम दीपप्रज्ज्वलनापासून सुरू होतो आणि पूजेच्या अखेरीला आरती असतेच. नवरात्रासारख्या उत्सवात देवीसमोर रात्रंदिवस तेवत राहणारा नंदादीप ठेवला जातोच, रोजच संध्याकाळी देवापुढे एक दिवा लावण्याची प्रथा होती. संधिकाळाच्या वेळेलाच दिवेलागणी असे नाव होते. दिव्याची अंवस आणि दीपावली हे तर खास दिव्यांचेच उत्सव असतात. देवळांच्या गाभाऱ्यामध्ये मोठमोठ्या समया असतातच, कांही ठिकाणी देवळांच्या समोर दगडांच्या उंचच उंच दीपमाळाही असतात.


दुसऱ्या चित्रामध्ये दाखवलेले सर्व दिवे देवघरात किंवा देवळांमध्ये ठेवण्यासाठी तयार केलेले आहेत. त्यामध्ये विविध घाट, सुंदर कलाकुसर आणि प्रतीकात्मकता आढळते. कांहींमध्ये देवतांची सुरेख चित्रे कोरलेली आहेत तर कांहीमध्ये पशुपक्षी. एका दिव्यात तर हत्तीवरील अंबारी आणि त्यातला माहूतसुध्दा दाखवला ओहे. कांहीं दिव्यांमध्ये एकच ज्योत आहे तर कांहींमध्ये अनेक वाती लावून अनेक ज्योतींसाठी सोय केलेली आहे.



भारतामध्ये देवाधर्मासाठी फक्त तेलातुपावर जळणाऱ्या दिव्यांचाच उपयोग केला जात असे, तर पश्चिमेकडील थंड प्रदेशात उजेडासाठी मेणबत्त्या लावल्या जात असत. पेट्रोलियमचा उपयोग सुरू झाल्यानंतर केरोसीन जाळून उजेड देणारे काचेचे कव्हर असणारे चिमणे दिवे आणि कंदील आले. तिसऱ्या चित्रामधील शैलीपूर्ण रोशनदानीमध्ये मेणबत्ती लावलेली आहे आणि तिच्यासंबंधीचे एक काव्य लिहिले आहे. ॐ आकाराच्या आणि पक्षीदीपांची खास वैशिष्टे दिली आहेत. बाकीचे दिवे चित्रकारांच्या कल्पनेतले आहेत.


जगामधील सर्वात उंच समई, कोरियामधील एक अजस्त्र दिवा, मेणबत्तीत दडून बसलेली कमनीय सुंदरी, काही जाळीदार सुंदर दिवे आदींची वैषिष्ट्यपूर्ण चित्रे चौथ्या चित्रात आहेत.




पुढील दोन चित्रांमध्ये मुख्यतः चित्रकारांची कल्पकता दाखवली आहे आणि शेवटच्या चित्रामध्ये शुभ दीपावलीचे सुबक असे संदेश आहेत.







Friday, November 02, 2018

धातूविद्येचा इतिहास

धातूविद्येचा इतिहास - भाग १




आर्किमिडीज आणि आर्यभटापासून ते जेम्स ब्रॅडलीपर्यंत जुन्या काळातल्या अनेक शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाची ओळख मी या मालिकेत करून दिली आहे. यातल्या प्रत्येकाने कांही प्रयोग करून नवी माहिती मिळवली आणि तिचा अभ्यास करून त्यामधून नवे शोध लावले होते, म्हणजे कांही नवे नियम किंवा सिद्धांत मांडले होते. हे प्रयोग करण्यासाठी त्यांनी निरनिराळी उपकरणे किंवा साधने वापरली होती. दोन हजार वर्षांपूर्वी आर्किमिडीजने एक तराजू, मोठे पातेले आणि परात यांचा उपयोग करून पाण्याच्या गुणधर्मांचा अभ्यास केला होता तर अठराव्या शतकात होऊन गेलेल्या ब्रॅडलीने त्याच्या काळातसुद्धा अत्यंत प्रभावशाली आणि संवेदनशील अशा दुर्बीणीमधून दूरच्या एका ताऱ्याची निरीक्षणे केली होती आणि तो तारा पहातांना त्याच्या स्थानामध्ये पडलेला एक अंशाच्या दोनशेवा हिस्सा इतका सूक्ष्म फरक मोजला होता. विज्ञानातल्या प्रयोगांसाठी लागणारी असली साधने झाडाला लागत नाहीत की इतर कुठल्याही मार्गे निसर्गातून मिळत नाहीत. बहुतेक सगळ्या शास्त्रज्ञांनी ती मुद्दाम तयार करून किंवा करवून घेतली होती. ती मुख्यतः कुठल्या ना कुठल्या धातूंपासून बनवलेली होती. त्यासाठी आवश्यक असलेले विशिष्ट गुणधर्म असणारे धातू त्यांच्या काळात उपलब्ध झाले होते आणि त्यांना हवा तसा आकार देणे शक्य झाले होते म्हणूनच त्या शास्त्रज्ञांना ती साधने मिळाली आणि आपले संशोधन करता आले. वाफेच्या इंजिनात तर अनेक सुटे भाग तयार करून जोडले होते. जेम्स वॉटच्या काळात ते शक्य झाले होते म्हणून त्याला आपले इंजिन तयार करता आले. याचाच अर्थ असा होतो की विज्ञानामध्ये झालेली प्रगती मेटॅलर्जी किंवा धातूविज्ञानामधील प्रगतीशी निगडित होती. म्हणूनच विज्ञानामधील प्रगतीचा मागोवा घेतांना या विद्येचा थोडक्यात आढावा घेणे जरूरीचे आहे.

इतिहासपूर्व काळापासून मानवाने निरनिराळ्या अनेक धातू शोधून काढल्या आहेत. पण त्यातले विज्ञान म्हणजे थिअरीचा किंवा सैद्धांतिक भाग गेल्या एक दोन शतकातलाच आहे. तोंपर्यंत त्यासंबंधीचे बहुतेक सगळे काम प्रत्यक्ष प्रयोगांमधूनच होत होते. त्यामुळे या शास्त्रामधील संशोधनात तंत्रज्ञानाचाच खूप मोठा वाटा आहे. पण ज्या महान तंत्रज्ञांनी ते काम केले आणि निरनिराळ्या धातूंमधून असंख्य प्रकारच्या वस्तू तयार केल्या त्या कुशल कारागीरांची नांवे मात्र कुठेच नोंदवलेली नाहीत. विज्ञान हा सुद्धा पूर्वीच्या काळी तत्वज्ञानाचाच भाग समजला जात होता. तत्वज्ञांना जेवढा मान किवा प्रसिद्धी मिळाली तशी ती तंत्रज्ञांना कधीच मिळाली नाही. उदाहरणार्थ जगद्गुरु शंकराचार्य किंवा ग्रीक फिलॉसॉफर सॉक्रेटिस यांची शिकवण समजली नसली तरी सगळे लोक त्यांची नांवे आदराने घेतात पण मदुराईचे मीनाक्षी मंदिर किंवा रोमचे कोलोजियम पाहून सगळे लोक थक्क होत असले तरी त्या भव्य इमारती कुणी आणि कशा बांधल्या हे तिथल्या गाईडना देखील माहीत नसते. 

धातूविज्ञानाची प्रगति कुठल्या क्रमाने होत गेली याची त्रोटक माहिती उपलब्ध आहे. पुरातत्ववेत्त्यांना (आर्किऑलॉजिस्ट) ठिकठिकाणी केलेल्या उत्खननांमध्ये जे अवशेष मिळतात त्यांची तपासणी करून त्या वस्तूचे अंदाजे वय आणि ती कशापासून तयार केली होती याचा अंदाज लागतो आणि तिला तयार करण्याचे कौशल्य आणि विद्या यांची माहिती समजते. त्यावरून पाहता उत्क्रांतीचा क्रम समजतो. त्याच्या आधाराने मानवाच्या इतिहासाचे अश्मयुग किंवा पाषाणयुग (स्टोन एज), कांस्ययुग (ब्राँझ एज) आणि लोहयुग (आयर्न एज) असे ढोबळ भाग पाडले आहेत. यातले प्रत्येक युग काही हजार वर्षांचे आहे. जगातल्या निरनिराळ्या भागात त्या काळांमधले त्यांचे अवशेष मिळतात आणि ते यापुढेही मिळत राहणार आहेत. नव्या धातूचा शोध लागला म्हणून आधीच्या धातूचा उपयोग करणे थांबत नाही. ते सगळे धातू आजतागायत उपयोगात आहेतच. त्यामुळे त्यातला कोणता धातू सर्वात आधी कधी आणि कुठे तयार केला गेला याचा एक निश्चित असा क्रम सांगता येणार नाही.

माणूस अजून पाषाणयुगात असतांनाच सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी त्याला सर्वात आधी सोने सापडले. सोने हा एक असा धातू आहे की तो आगीमध्ये जळत नाही की पाण्यामध्ये गंजत नाही. त्याची आणखी कुणासोबत संयुगे न होता तो नैसर्गिक स्थितीमध्ये लक्षावधी वर्षे जमीनीत पडून राहिला आहे. यामुळे कधी माती खणतांना किंवा दगड फोडतांना त्यात चकाकणारे सोन्याचे लहानसे गोळे माणसाला मिळाले आणि त्याने ते जपून ठेवायला सुरुवात केली.  पण हा धातू पूर्वीपासूनच दुर्मिळ आणि मौल्यवान असल्यामुळे त्याचा उपयोग दागदागिने करण्यासाठी आणि धनदौलत म्हणूनच होत राहिला.

सुमारे सहा सव्वासहा हजार वर्षांपूर्वी तांबे हा पहिलाच धातू माणसाने कृत्रिम रीत्या तयार केला. त्याच्या खनिजाला म्हणजे एकाद्या ठिकाणच्या मातीला मोठ्या जाळात भाजत असतांना त्यातून वितळलेले तांबे बाहेर पडले. तो धातू कुठल्या मातीपासून आणि कसा तयार करायचा आणि त्याला कसा आकार द्यायचा यावर पुढील दोन अडीच हजार वर्षे अनेक प्रकारचे प्रयोग करून माणसाने त्यात हळूहळू प्राविण्य मिळवले. कांस्ययुगाच्या सुरुवातीचा भाग असलेल्या या कालखंडाला ताम्रयुग असेही म्हंटले जाते. शुद्ध तांबे फारच मऊ असल्यामुळे त्याचा लढाईसाठी फारसा उपयोग नव्हता. तांब्याचा शोध लागल्यानंतर माणसाला आर्सेनिक, कथील, शिसे असे आणखी कांही धातू सापडले आणि कांही कामांसाठी त्यांचाही उपयोग व्हायला लागला.  वितळलेल्या तांब्यामध्ये आर्सेनिक किंवा कथील असा दुसरा धातू मिसळला तर ते मिश्रण थंड झाल्यानंतर त्यामधून जास्त कणखर आणि टिकाऊ पदार्थ तयार होतो असे सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी माणसाला समजले. अशा मिश्रधातूला कांस्य (ब्राँझ) म्हणतात. त्याचे गुणधर्म पाहता त्याचा अधिक प्रमाणात उपयोग व्हायला लागला आणि कांस्ययुग बहराला आले. ते आणखी सुमारे पुढील हजार वर्षे टिकले. काही ठिकाणच्या खाणीमधील खनिजातच तांब्याबरोबर इतर एकादी धातू मिसळलेली असल्यामुळे त्यामधून थेट कांस्यच तयार झाले. यामुळे कांस्ययुग हे पूर्वीपासून मानले जाते. जगाच्या पाठीवरील भारतासह अनेक देशांमध्ये केलेल्या उत्खननांमध्ये कांशाच्या मूर्ती तसेच शस्त्रास्त्रे सापडली आहेत. ताम्रयुगातल्या वस्तूंपेक्षा या किती तरी सुबक आहेत हे चित्रावरून लक्षात येईल.
----------------------------------------

धातुविद्येचा इतिहास - भाग २




ओल्या मातीपासून तयार केलेल्या वस्तूला भट्टीत भाजल्यावर कणखरपणा आणि टिकाऊपणा येतो हे माणसाला पाषाणयुगातच समजले होते आणि तो विटा, कौले, गाडगी, मडकी वगैरेंचा वापर करायला लागला होता. त्याने निरनिराळ्या प्रकारच्या आणि आकारांच्या भट्ट्या तयार केल्या. या कुंभारांच्या भट्ट्यांमध्ये दगडमातीवर केलेल्या प्रयोगांमधून तांबे, कथिल, शिसे यासारख्या धातूंचे शोध लागत गेले. कमी तापमानावर वितळणारे धातू कांस्ययुगात सापडले. त्यांचा अधिक अभ्यास आणि प्रयोग करून ते धातू आणि त्यांचे मिश्रधातू तयार करून त्यांना आकार देण्याच्या तंत्रज्ञानाचा विकास होत गेला.

सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी लोखंडाचा शोध लागला आणि त्याने जगाच्या इतिहासाचे रूप पालटले. तेंव्हा सुरू झालेले लोहयुग दोनशे वर्षांपूर्वीपर्यंत तर चाललेले होतेच, किंबहुना ते अजून चाललेले आहे असेही म्हणता येईल. लोखंड हा धातू खनिजांच्या स्वरूपात पृथ्वीवर भरपूर प्रमाणात सापडतो, पण त्यापासून लोखंड तयार करण्याची क्रिया सोपी नाही. सुमारे साडेतीन ते चार हजार वर्षांपूर्वीच्या कांही उद्योगशील लोकांनी लोखंडाचे खनिज आणि कोळसा यांना चुनखडीसारख्या आणखी कांही पदार्थांसोबत खास प्रकारच्या भट्ट्यांमध्ये खूप जास्त तापमानापर्यंत भाजले आणि त्यातून लोखंड तयार केले. या धातूच्या अद्भुत गुणधर्मांमुळे त्याने इतर धातू आणि कांस्य यांना बाजूला सारून आघाडी मारली.  इतिहासातले कांस्ययुग संपून लोहयुग सुरू झाले असे म्हंटले जात असले तरी पुढील काळातही, अगदी आजमितीपर्यंत तांबे, कथिल, शिसे, कांस्य आदी त्या युगातल्या धातूंचा विशिष्ट कामांसाठी उपयोग होतच राहिला आहे.

लोखंडाचे निरनिराळे प्रकार आहेत आणि त्यांच्या गुणधर्मानुसार त्याचा उपयोग केला जातो. लहान भट्ट्यांमध्ये लोखंड तयार करतांना त्याच्या द्रवणांकापेक्षा (melting point) कमी तापमानावर तप्त लोखंडाचा स्पंजसारखा गोळा तयार होतो. त्याहून अधिक तपमानावर ते वितळते तसेच त्यात कर्ब (कार्बन) मिसळले जाऊन त्याचे कच्चे लोखंड (पिग आयर्न) बनते. प्राचीन काळातल्या कांही ठिकाणी पहिल्या आणि कांही जागी दुसऱ्या प्रकाराने लोखंड तयार होत होते. या दोघांच्याही गोळ्यांना पुन्हा तापवून ते मऊ झाल्यावर त्यांना ठोकून एकत्र जोडता येते तसेच गोल किंवा चपटा असा आकार देता येतो. या प्रकाराला रॉट आयर्न (Wrought Iron) म्हणतात. दिल्ली येथील प्रख्यात लोहस्तंभ खास प्रकारच्या रॉट आयर्नचा आहे.

लोखंडाला वितळवून आणि साच्यात ओतून वेगवेगळ्या आकारांच्या ओतीव लोखंडाच्या (Cast Iron) वस्तू तयार करता येतात. या वस्तू कणखर आणि मजबूत असतात, पण त्या कांही प्रमाणात ठिसूळ असल्यामुळे त्यांना तडे जाऊ शकतात. लोहामध्ये विशिष्ट प्रमाणात कर्ब आणि सिलिकॉन, मँगेनीज यांचेसारखी इतर कांही द्रव्ये मिळवली तर त्यामधून पोलाद तयार होते. हा धातू मजबूत तसाच लवचीकही असतो. पोलादाला तापवून पाण्यात बुडवले तर ते जास्तच कणखर होते. त्याला धार लावता येते आणि ती बोथट न होता टिकून राहते. यामुळे त्यापासून भाले, कट्यार, खंजीर आणि तलवारी यांच्यासारखी शस्त्रे तयार होऊ लागली आणि या पोलादी शस्त्रांमधून सामर्थ्य निर्माण झाले. आदिमानव लहान टोळ्यांमध्ये रहात होते. मानवाच्या हातात घातक शस्त्रे हातात आल्यानंतर मोठी राज्ये-साम्राज्ये तयार झाली, त्यांनी शस्त्रास्त्रांनी सुसज्ज अशी सेनादले बाळगली आणि त्यांच्या जोरावर ते लोक आक्रमणे व युद्धे करायला लागले. पुढे तोफा, बंदुका यासारखी लांब पल्ल्यावर मारा करणारी शस्त्रेही निघाली आणि त्यामुळे जगभरात कमालीची उलथापालथ झाली.
   
शस्त्रे आणि अवजारे यांचा विकास नेहमीच हातात हात घालून होत आला आहे. पोलादाचे गुण पाहून त्याचा उपयोग शेती, उद्योग आणि घरातदेखील व्हायला लागला. शेतकामासाठी कुदळ, पहार, कुऱ्हाड यासारखी, कारखान्यांसाठी हातोडे, घण, करवती वगैरे, यंत्रे आणि वाहने यांच्यासाठी चक्रे आणि घरातल्या उपयोगासाठी सुरी, कात्री, दाभण, तवा, झारा अशी अनेक अवजारे तयार होत गेली. लोहारकाम हा एक महत्वाचा उद्योग सुरू झाला. लोखंड आणि पोलादाच्या शोधानंतर अशा प्रकारे माणसाच्या जीवनाला आणि इतिहासाला कलाटणी मिळाली. या सगळ्या गोष्टींची सुरुवात सुमारे अडीच तीन हजार वर्षांपूर्वी झाली. 

त्यानंतर लोखंड तयार करण्याच्या विद्येत अनेक सुधारणा होत गेल्या. चांगल्या दर्जाचे खनिज वापरणे, भट्ट्यांचा आकार वाढवणे, त्यांमध्ये जाळण्यासाठी चांगल्या ज्वलनशील लाकडांपासून केलेला कोळसा तयार करणे, आगीची आंच वाढवण्यासाठी भात्याने हवा पुरवत राहणे यासारखे प्रयत्न होत राहिले. साध्या कोळशाशिवाय दगडी कोळशाचाही उपयोग सुरू झाला. त्यामधून लोखंडाचे उत्पादन वाढत गेले. लोखंडामध्ये इतर धातू मिसळून निरनिराळ्या यंत्रांना किंवा शस्त्रांना उपयुक्त असे विशिष्ट गुणधर्म असलेले किंवा कमी गंजणारे अनेक प्रकारचे मिश्रधातू तयार होत गेले, त्यांना पत्रे, सळ्या किंवा नळ्या अशासारखे आकार देऊन आणि त्यांचा उपयोग करून नवी शस्त्रास्त्रे तसेच यंत्रे आणि उपयोगाची साधने तयार होत गेली .

धातुविद्येमध्ये सुमारे तीनशे वर्षांपूर्वीच्या काळापर्यंत झालेल्या प्रगतीचा थोडक्यात आढावा या लेखात घेतला आहे. त्यानंतर म्हणजे वाफेच्या इंजिनाच्या शोधापासून सुरू झालेल्या यंत्रयुगामध्ये खाणीमधून खनिजे काढणे, त्यापासून निरनिराळे धातू निर्माण करणे, नवनवे नवीन धातू शोधून काढणे आणि या सर्वांपासून उपयोगाच्या वस्तू तयार करणे या सर्वच बाबतीत झपाट्याने वाढ झाली. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पुढील काळात झालेल्या प्रगतीची चर्चा करतांना त्याची माहिती येईल.