Thursday, May 30, 2019

आवारा ते . . . . . Avengers


तारकासुर, नरकासुर, बकासुर, अमकासुर, तमकासुर असा एकादा दैत्य अतीशय बलवान आणि उन्मत्त होतो आणि सज्जन लोकांना पिडायला लागतो, त्यांच्यावर जुलुम जबरदस्ती करायला लागतो. ते बिचारे काही करू शकत नाहीत अशा दयनीय अवस्थेत सापडलेले असतांना एकादी देवता किंवा देव अवतार धारण करतो आणि त्या दुष्टाचा संहार करून गरीब लोकांना त्याच्या तावडीतून सोडवतो. अशा प्रकारच्या अनेक गोष्टींनी आपली पुराणे भरलेली आहेत. रामायण व महाभारत या खंडकाव्य़ांमध्ये दुष्ट आणि सुष्ट प्रवृत्तींचे अधिक सविस्तर वर्णन केले आहे आणि त्यांच्यामधील संघर्षातल्या एकेका प्रसंगाचे तपशीलवार वर्णन केले आहे.

पाश्चात्य पुराणातसुद्धा गोलियाथसारखे राक्षस आहेत आणि अरबी सुरस कथांमध्ये अल्लाउद्दिनचा दुष्ट काका तसेच अलीबाबाच्या गोष्टीतले चाळीस चोर आहेत. ते आधी यशस्वी होत असतात, पण गोष्टींचा शेवट त्यांच्या संहाराने होतो. ख्रिश्चन धर्मात अवतार या कल्पनेला थारा नसल्यामुळे रॉबिनहूडसारख्या वीरांच्या दंतकथा तयार झाल्या. या सगळ्या कथांमधली मुख्य गोष्ट दुष्ट वृत्तीचा पराभव आणि सुष्टांचा विजय इथे संपते कारण लोकांना तसाच शेवट हवा असतो. लोक अशाच गोष्टी  आपल्या मुलांना किंवा शिष्यांना सांगतात आणि ते त्यांच्या मुलांना आणि शिष्यांना सांगतात अशा तीन पिढ्या तर मीच पाहिल्या आहेत. या प्रकारे होत असलेल्या प्रसारातूनच अशा गोष्टी गेली हजारो वर्षे टिकल्या आहेत.

मुद्रणाची सोय नसतांना सगळे हातानेच लिहावे लागत असल्यामुळे पुराणांच्या पोथ्या दुर्मिळ असायच्या. कोणी शास्त्री, पुराणिक त्या वाचून दाखवत असत, तसेच कीर्तन किंवा प्रवचनांमधून गावातल्या लोकांना सांगत असत. ग्रामीण भागात लोकप्रिय असलेले पोवाडे किंवा वग यामधूनसुद्धा अशाच आशयाच्या गोष्टी तिखटमीठ लावून सांगितल्या जात असत आणि तिथे प्रेक्षक त्यांना टाळ्याशिट्यांनी दाद देत असत.

पुस्तकांची छपाई सुरू झाल्यानंतर कथा, कादंबऱ्या, नाटके आदिंमधून नवनव्या गोष्टी लिहून प्रसिद्ध करण्याला बहर आला. मराठी नाट्यसृष्टी निर्माण झाल्यानंतर त्याचच्या सादरीकरणाची नवी सोय झाली. त्यानंतर सिनेमा आला आणि मनोरंजनाचे मुख्य साधन झाला. पुढे टेलिव्हिजन, इंटरनेट वगैरे माध्यमे येत गेली. या सर्व ठिकाणच्या गोष्टींमधला तपशील बदलला तरी सुष्टदुष्ट हा मुळातला गाभा तसाच राहिला. काही ठिकाणी याच्या विपरीत झालेले दाखवले गेले तरी ते लोकांच्या मनाला भावत नाही.

माझ्या लहानपणच्या काळात म्हणजे साठपासष्ठ वर्षांपूर्वी दिलीपकुमार आणि राजकपूर हे नट आघाडीवर होते. त्यातल्या आजाद, गंगाजमुना यासारख्या दिलीपकुमारच्या सिनेमांना उत्तर भारतातल्या ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असायची तर आवारा, श्री ४२०, अनाडी यासारख्या राजकपूरच्या सिनेमातल्या बहुतेच घटना मुंबईतच घडत असत. बदल म्हणून कधी राजकपूरही चंबळच्या खोऱ्यात जाऊन "जिस देश में गंगा बहती है" म्हणायचा किंवा थंड हवेच्या ठिकाणी 'आह' भरायचा तर दिलीपकुमार सुटाबुटात स्मार्टपणे वावरायचा. ते काहीही असले तरी कथानकांमध्ये नायकनायिकांच्या जोडीला खलनायक हवाच. मग तो खेड्यातला जमीनदार, साहूकार किंवा डाकूंचा सरदार असेल किंवा शहरातला दादा, बदमाश, स्मगलर किंवा धनाढ्य व्यापारी, कारखानदार असेल. सुरुवातीपासून पहिल्या नव्वद टक्के भागात खलनायकाची सरशी आणि शेवटी काही चमत्कार होऊन त्याचा पाडाव हा ठरलेला फॉर्म्यूला असायचा.

प्रेक्षकांना काही वेगळी प्रेक्षणीय स्थळे दाखवण्यासाठी गोष्टींमध्ये सिमला, दार्जिलिंग, उटी वगैरे हिल स्टेशन्स किंवा गोवा, केरळ, लक्षद्वीप यासारखे सागरकिनारे आणले गेले. सिनेमा उद्योगाची आर्थिक परिस्थिती जरा बरी झाल्यानंतर थेट काश्मीरची पार्श्वभूमी आणली. त्यात आणखी सुधारणा झाल्यावर स्विट्झर्लंड, पॅरिस, लंडन, टोकियो करत सिनेमा इंटरनॅशनल झाला आणि त्यासोबतच खलनायकांचेसुद्धा प्रमोशन होऊन ते आंतरराष्ट्रीय टोळ्यांचे म्होरके झाले. वेगळ्या जागीही सिनेमातला सुष्टदुष्टांचा संघर्ष राहिलाच.

पण हे फक्त भारतातच होत असते असे नाही. मला जेंव्हापासून इंग्रजी वाचायला यायला लागले त्या काळापासून मी फँटम आणि मँड्रेकच्या कॉमिक्स वाचत आलो आहे. पुढे अॅस्टेरिक्स आणि टिनटिन आवडायला लागले. त्यातच हीमॅन, बॅटमॅन, सुपरमॅन आणिक कोणकोणते मॅन यांचे दौरे आले. या सगळ्या गोष्टींमध्ये 'गुड व्हर्सेस ईव्हिल' याच गाभ्यावर आधारलेल्या निरनिराळ्या गोष्टी असायच्या आणि अखेरीस गुडने बॅडवर मात केली की वाचक खुश ! इंग्रजी सामाजिक सिनेमांच्या गोष्टी त्याच तालावर असायच्या. युद्धपटांमध्ये जर्मनीजपान हे व्हिलन असल्यामुळे ते सगळे वाईट आणि ब्रिटिश अमेरिकन हीरो असे दाखवले जायचे.

युरोपअमेरिकेमधले लोक आपल्या दृष्टीने 'फॉरेन'मधे रहातच असल्यामुळे त्यांना बर्फाचे डोंगर किंवा उंच इमारती, प्रशस्त रस्ते वगैरेंचे काय कौतुक असणार? त्यांच्यासाठी अमेझॉनचे घनदाट जंगल किंवा पॅसिफिक महासागराच्या तळाशी असलेली झुडुपे अशा गोष्टी दाखवल्या गेल्या, पण त्या तरी किती पाहणार? मग त्यांची नजर अवकाशाकडे वळली. परग्रहावरून उडत्या तबकड्यांमधून आलेले माणसांसारखे एलियन्स किंवा विचित्र आकारांचे प्राणी यांच्या फिल्म्स आल्या. जुरासिक पार्कमध्ये लक्षावधी वर्षांपूर्वी नष्ट झालेले अजस्त्र डायनोसॉरस आणि इतर काही सॉरस पुन्हा भूमीवर अवतरले. 

पंचवीस वर्षांपूर्वी आलेली स्टार ट्रेक ही सीरियल चांगली हिट झाली. त्यातले कॅप्टन कर्क, मि.स्पॉक, डॉ.मॅकॉय आणि इतर क्र्यू मेंबर्स स्टारशिप यू एस एस एंटरप्राइज या स्पेसशिपमध्ये बसून निरनिराळ्या ग्रहावरील राक्षसांचे दमन करत असत. त्यांच्याकडे अनेक नवनव्या प्रकारची शस्त्रे असत तसेच हवे तेंव्हा एका ठिकाणी अदृष्य होऊन दुसऱ्याच ठिकाणी जाऊन प्रगट होण्याची कला असायची. या मालिकेत सायन्स फिक्शनचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला.

आल्बर्ट आइनस्टाइनने सापेक्षतावादाचा शोध लावल्यावर त्यातून निघालेल्या निष्कर्षांमधून टाइम मशीनची अफलातून कल्पना निघाली. या मशीनमध्ये बसून नायक, नायिका तसेच खलनायक क्षणार्धात शेकडो वर्षे भविष्यात किंवा भूतकाळात जाऊन वावरायला लागले. मग त्या काळात त्यांनी केलेल्या उचापतींचे वर्तमानकाळात काय परिणाम होतात यावर कल्पनेच्या भराऱ्या मारल्या गेल्या. हेही एक प्रकारचे सायन्स फिक्शन होते.

संगणकक्रांतीमुळे इतर क्षेत्रांप्रमाणेच मनोरंजनाच्या क्षेत्रातही उलथापालथ झाली. पूर्वी निरनिराळ्या पात्रांसाठी चित्रविचित्र पोशाख करावे लागत असत आणि त्याला मर्यादा असायच्या. ट्रिकसीन्ससाठी काही चमत्कार अरेंज करून दाखवावे लागायचे त्यासाठी भरपूर कष्ट करावे लागत असत. आता कॉंप्यूटर ग्राफिक्सच्या सहाय्याने कुठल्याही आकाराचे विचित्र प्राणी आणि पक्षीसुद्धा तयार करून त्यांना वाटेल तसल्या हालचाली करतांना दाखवता येतात.

सुपरमॅन, बॅटमॅन वगैरे हीरो एकएकटे संघर्ष करत असत. मार्वेल कॉमिक्सने अॅव्हेंजर्स नावाची अशा वीरांची टोळीच तयार केली. कॅप्टन अमेरिका, ब्लॅक विडो, हल्क, ठोर, आयर्नमॅन, ब्लॅक नाइट इत्यादी अनेक सुपर हीरोज मिळून अख्ख्या गॅलॅक्सीचे रक्षण करत असतात. मार्वेलने अॅव्हेंजर्सच्या सिनेमांची एक मालिका सुरू केली. मागील महिन्यात रिलीज झालेल्या अॅव्हेंजर्स - दि एंड गेम या सिनेमात सगळा मसाला ठासून भरला होता. निरनिराळ्या उपग्रहांवरील विचित्र आणि भयानक आकारांचे पशुपक्षी, किडेमुंग्या आणि टाइममशीनमधून हवे तेवढे भूतकाळात किंवा भविष्यकाळात जाण्यायेण्याची सोय, अनेक प्रकारची महाभयंकर शस्त्रास्त्रे वगैरेंमुळे त्यात प्रचंड वैविध्य आले आहे, थ्रीडीव्हिजन, सराउंड साउंड वगैरेमुळे ते सगळे चित्तथरारक प्रकार अगदी आपल्या आसपास घडत असल्याचा भास होतो. अशा सगळ्या गुणांनी युक्त असा हा सिनेमा जगातल्या हजारो थेटरांमध्ये एकदम प्रदर्शित झाला आणि तो पाहणाऱ्यांच्या गर्दीचे आणि उत्पन्नाचे जागतिक रेकॉर्ड्स मोडत चालला. पुण्यातल्याच अनेक मॉल्समधील मल्टिस्क्रीन थिएटरमधील सगळे ५-६ पडदे या सिनेमाला दिले होते आणि एरवी दिवसाकाठी होणारे चार पाच खेळसुद्धा हाउसफुल होत असल्याने शनिवार रविवारी आणखी जादा खेळ ठेवले होते.

थॅनोस नावाचा महाविध्वंसक राक्षस अद्भुत शक्तीशाली इन्फिनिटी स्टोन्सच्या सहाय्याने सगळ्या विश्वामधील अर्धी जीवसृष्टी गायब करतो तेंव्हा टोनी स्टार्क, नेब्यूला, बॅनर, स्टीव्ह, ठोर, नताशा, लँग्ज वगैरे अनेक अॅव्हेंजर्स एकत्र येऊन लढा देतात. टाइम मशीनमधून मागे जाऊन ते स्टोन्स काबीज करतात आणि नष्ट झालेल्या जीवांना परत आणतात, पण थॅनोस आपल्या सैन्यानिशी त्यांच्या ग्रहावर हल्ला करतो. त्याच्याशी घनघोर लढाई होते त्यात अनेक उलथापालथी झाल्यानंतर अखेरीला स्टार्क हा अॅव्हेजर त्या स्टोन्सचाच उपयोग करून थॅनोसला नष्ट करतो, पण त्यातून निघालेल्या अपार ऊर्जेमुळे त्याचाही बळी जातो. मात्र बाकीचे विश्व सुरक्षित राहते. अशा प्रकारे शेवट गोड होतो आणि सगळे प्रेक्षक आनंदात घरी जातात.

मी या मालिकेतला हा पहिलाच चित्रपट पाहिला असल्यामुळे अनभिज्ञ होतो, पण मुख्यतः किशोरवयातले आणि युवा प्रेक्षक प्रत्येक अॅव्हेंजर हीरो पडद्यावर दिसला रे दिसला की टाळ्या आणि किंकाळ्यांनी त्याचे स्वागत करत होते आणि त्याने केलेल्या प्रत्येक प्रहारावर गलका करून थिएटर डोक्यावर घेत होते. अशा प्रकारचा प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मी पहिल्यांदाच पहात होतो. मला मात्र मुख्य पात्रेच ओळखीची नसल्यामुळे थेटरमधल्या आरडाओरडीमधूनच आलेले पात्र सुष्ट आहे की दुष्ट आहे त्याचा अंदाज होत होता. मला तर सगळेच अक्राळ विक्राळ दिसत होते किंवा त्यांनी तसले मुखवटे लावले होते. जे त्यातल्या त्यात जास्त भयानक आणि हिडीस आणि कुत्सित किंवा विकराल हास्य करणारे ते दुष्ट राक्षस अशी मी एक खूणगाठ बांधून घेतली होती, पण केंव्हा केंव्हा माझा अंदाज चुकतही होता. मुख्य खलनायकाने कितीही विध्वंस केला तरी शेवटी त्याचा नाश होणारच हा माझा अंदाज मात्र बरोबर ठरला.


Friday, May 17, 2019

स्मृती ठेउनी जाती - भाग १६ - तात्या अभ्यंकर

स्व.तात्या अभ्यंकर यांना त्यांच्या चाहत्यांनी  मनोगत, फेसबुक आणि मिसळपाव या स्थळांवर दिलेल्या श्रद्धांजलींचे एक संकलन इथे वाचा.

तेरा वर्षांपूर्वी रिटायर झाल्यानंतर मला आंतर्जालावर भटकायला भरपूर वेळ मिळायला लागला. त्या काळात मराठीमधून तिथे लिहिण्याची सुरुवातच होत होती. ते पाहून लहानपणापासून माझ्या मनात दडून बसलेली एक ऊर्मी उफाळून आली आणि मी माझा ब्लॉग सुरू केला. पण त्या काळात तो कोणी वाचतात का ते मला समजायला मार्ग नव्हता. कुणालाही मुक्त प्रवेश असलेल्या मनोगत या संकेतस्थळाची माहिती मला काही दिवसांनी मिळाली आणि मी चाचपडतच मनोगतवर प्रवेश केला. इथले सदस्य तिथे आलेले बहुतेक लेखन कसेही असले तरी वाचत असत आणि लगेच त्यावर कॉमेंट्सही देत असत.

तेंव्हा तिथे छोटा डॉन, पिवळा डँबिस, ३.१४विक्षिप्त, चित्त, केशवसुमार, अत्त्यानंद अशांसारखी नावे धारण करणारी दादा मंडळी होती आणि काही लोक आपल्या खऱ्या नावानेही तिथे वावरत असत. त्यांच्याबरोबर एक विसोबा खेचर होता. त्याचे कधी अत्यंत खुसखुशित तर कधी सडेतोड किंवा घणाघाती लिखाण मला खूप आवडायचे. संगीतावर लिहितांना तो खूप समरस होऊन त्यातले बारकावे समजाऊनही सांगत असे. नंतरच्या काळात त्याने रौशनी या नावाची एक दीर्घकथा लिहिली. सुरुवातीच्या काळात मनोगतवर त्याचा रोजचा वावर होता आणि निरनिराळ्या लोकांनी टाकलेल्या पोस्टांवरसुद्धा तो तुफान फटकेबाजी करत असे, कुणाची टोपी उडव, कुणाच्या पंच्याला हात घाल वगैरे त्याचे उद्योग बहुतेक सगळेजण मोकळेपणाने घेत असत कारण त्यात निखळ विनोद असायचा, कुजकटपणा किंवा द्वेश नसायचा. थोड्याच अवधीत मीसुद्धा त्याचा फॅन झालो होतो.

मनोगतवरील लेखांवर होत असलेल्या टोलवाटोलवीचे रूपांतर कधी कधी व्यक्तीगत भांडणांमध्ये व्हायला लागले ते पाहून तत्कालीन संचालकांनी एक प्रकारची सेन्सॉरशिप जाहीर केली. त्यामुळे प्रत्येक लिखाण किंवा त्यावरील टीका, टोमणे वगैरे आधी कुणीतरी नजरेखालून घातल्यानंतर ते प्रकाशित करायचे असे त्याचे स्वरूप झाले. पण स्पॉंटेनियटी हा तर त्या वादविवादांचा जीव होता. ती उत्स्फूर्तता गेली तर ते स्थळ निर्जीव किंवा सपक झाले असते. यावर विचार करण्याच्या निमित्याने विसोबाच्या पुढाकारातूनच एकदा मनोगतचा कट्टा जमवायचे ठरले. (ही गोष्ट मला आता समजली.) मनोगतवर वावर असलेली ही मंडळी आहेत तरी कोण? याची मला उत्सुकता असल्याने मीही त्याला हजेरी लावली.

ठाण्यातल्या एका प्रशस्त घरात आम्ही २०-२५ जण जमलो होतो. तिथे मला कळले की या अवलियाचे खरे नाव तात्या अभ्यंकर असे आहे. गोरा गोमटा, अंगाने स्थूल, चेहऱ्यावर बेदरकारीचा आणि तितकाच आपुलकीचा भाव, मनमोकळे अघळपघळ बोलणे वगैरेंनी युक्त अशा तात्याचे माझ्यावर पहिले इंप्रेशन चांगले पडले. आम्हा दोघांच्या वयात २०-२५ वर्षांचा फरक असला तरी आमचे बरे सूत जमले. तात्या तर त्या कट्ट्याचा संयोजक, सूत्रसंचालक आणि प्रमुख पाहुणा वगैरे सबकुछ होता. त्याने आपुलकीने सर्वांची चांगली आवभरत केली, आपल्या विनोदी बोलण्यामधून थट्टामस्करी करत सर्वांना हसत खेळत ठेवलेच, थोडी तात्विक चर्चाही केली आणि थोडा बिहाग रागही गाऊन दाखवला. सगळ्या अनोळखी लोकांनी जमवलेला तो कट्टा म्हणजे माझ्यासाठी एक विलक्षण आणि संस्मरणीय असा अनुभव होता. तिथे मला पहिल्यांदा भेटलेले काही सदस्य माझे जन्मभराचे मित्र झाले.

तात्याचे बिंधास वागणे किंवा बेछूट लेखन कदाचित मनोगतमधल्या काही विद्वानांना मानवत नसेल आणि त्यांनी ढवळाढवळ केलेली तात्याला चालत नसेल. यावर उपाय म्हणून तात्याने स्वतःचे मिसळपाव हे नवे संकेतस्थळ काढले आणि त्याच्याच शब्दातले त्याचे हे 'हॉटेल' उत्तम प्रकारे चालवले. तिथली सदस्यसंख्या आणि तिथे येणाऱ्या लेखांची संख्या भराभर वाढत गेली. मनोगतवरील तात्याचे अनेक मित्र तिथे रोजच्या रोज काहीबाही लिहीत होतेच, इतरही अनेक नवे सदस्य तिकडे आकर्षिले गेले आणि ज्ञान व मनोरंजन यांचा एक खजिनाच मराठी वाचकांना उपलब्ध झाला. या अजब प्रकारच्या हॉटेलातले काम कसे चालत असे यावर मी दहा वर्षांपूर्वी लिहिलेला एक हलका फुलका लेख खाली दिला आहे.

काही वर्षांनंतर तात्याने बहुधा मिसळपावमधूनही आपले अंग काढून घेतले आणि फेसबुकवर शिळोप्याची ओसरी काढली आणि तीही छान चालवली. तिथेही रोजच त्याचे स्वतःचे आणि इतर मित्रांचे मजेदार लेखन वाचायला मिळत असे. माझी जुनी ओळख लक्षात ठेऊन त्याने या दोन्ही ठिकाणी मला पाचारण केले होते आणि मीसुद्धा तो माझा बहुमान समजून अधून मधून दोन्हीकडे चकरा मारून येत होतो. अलीकडच्या काळात वॉट्सॅप आल्यानंतर बेसुमार वाढलेल्या माझ्या इतर व्यापांमुळे मी अलीकडे तिकडे फारसा जाऊ शकत नव्हतो. तात्यासुद्धा काही वेळा कित्येक दिवस अदृष्य होत असे. त्यामुळे अलीकडल्या काळात माझी त्याच्याशी आंतर्जालावर गाठ पडली नव्हती आणि आज अचानक त्याच्या अकाली निधनाची धक्कादायक बातमी आली. ईश्वर त्याच्या आत्म्याला सद्गति देवो अशी प्रार्थना.

तात्याच्या व्यक्तीगत जीवनाविषयी मला काहीच माहिती नव्हती. मी त्याला पहिल्यांदा भेटलो तेंव्हा तो कसला तरी व्यवसाय करतो एवढेच समजले होते. त्याचा परिस्थिती खाऊन पिऊन सुखी अशी दिसत होती. तो आपल्या लेखांमध्ये स्वतःबद्दल काहीबाही लिहायचा, पण त्यातले किती खरे मानायचे आणि किती काल्पनिक ते समजायला मार्ग नव्हता. तो गेल्यानंतर त्याला दिल्या गेलेल्या श्रद्धांजलींमधून मला माहीत नसलेली बरीच नकारात्मक माहिती पुढे आली. त्याच्या कुठल्याशा व्यवसायामध्ये त्याला मोठी खोट बसल्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती असे वाटते. तो इतके छान लिहीत असे, पण या उपजत प्रतिभेमधून त्याला कधीच खूप पैसे मिळवता आले नाहीत. त्याने दिवसातला बराच वेळ लेखनामध्ये खर्ची घातला, पण त्यातून कमाई करायचा प्रयत्नच केला नाही की आज घडीला त्याला सोयिस्कर मार्केट नाही कोण जाणे! पुस्तके लिहून प्रकाशित करणे किंवा कथा, पटकथा, संवाद वगैरे लिहिणे अशा गोष्टी तो छानपणे करू शकला असता असे मला तरी वाटते. तो एक उत्तम गायक होता, त्याचे मोठमोठ्या संगीतकारांशी किती चांगले संबंध होते ते तो फोटोंसह आपल्या लेखांमध्ये सांगत असे. पण त्याने या कलागुणाचाही व्यवसाय केला नसावा.  "गंधर्वांना शाप असतात म्हणे" असे पु.ल.देशपांड्यांनी नंदा प्रधान या पात्राबद्दल लिहितांना  लिहिले आहे. तात्या अभ्यंकरच्या जीवनाकडे पाहतांना तोसुद्धा एक असाच शापित गंधर्व असावा असे मला वाटले.

ठाण्यातल्या कट्ट्यात झालेल्या ओळखभेटीनंतर पुन्हा कधी आमची गाठभेट झाल्याचे आठवत नाही कारण आमची विश्वे संपूर्णपणे वेगवेगळी होती. त्यात आम्हाला एकत्र येण्याचे काही प्रयोजन किंवा कारण नव्हते. तसा योगायोगही आला नाही. पण मनोगत, मिसळपाव आणि शिळोप्याची ओसरी या स्थळांवर अधूनमधून माझे जाणे होत असल्यामुळे त्याचे प्रखर तसेच खेळकर अस्तित्व मात्र सतत जाणवत राहिले. आता ते सगळे संपले, पण त्याच्या स्मृती मनाच्या एकाद्या कोपऱ्यात नेहमी राहणार आहेत.
-----------------------------------------------------



आपले लाडके श्री.तात्या अभ्यंकर आज आपल्यात राहिले नाहीत. त्यांच्या मिसळपाव या संकेतस्थळाबद्दल मी दहा वर्षांपूर्वी लिहिलेला एक लेख त्यांच्या स्मरणार्थ खाली देत आहे. जे वाचक जुने मिपाकर असतील तर त्यांना ते कदचित दिवस आठवत असतील.
.... आनंद घारे


मिसळपाववरील पहिले वर्ष


एक वर्षापूर्वी मी मिसळपावच्या हॉटेलात पहिले पाऊल ठेवले. ते कोण चालवत असे याची त्या वेळी मला कांही कल्पना नव्हती. पण आंत आल्या आल्या तात्यासाहेबांनी जुनी ओळख दाखवून मोठ्या अगत्याने "या, बसा." असे म्हणत माझ्याकडे खुर्ची सरकवली. आजूबाजूला बसलेल्या लोकांत कांही ओळखीचे चेहेरे आणि मुखवटे पाहून मलाही आपल्या माणसांत आल्यासारखे वाटले. काउंटरवर जाऊन मी थाळी भरून घेतली. जेवण तर मस्तच होते. तेंव्हापासून मी इकडे येत राहिलो. मधील काळात कधी मला तर कधी माझ्या संगणकाला विषाणूंची बाधा झाली, कधी मी परगांवी गेलो वगैरे कारणांमुळे मला अवकाशाशी जडलेले नाते राखता आले नाही. ते पुन्हा जुळेपर्यंत पोस्टाच्या पेटीत पत्रांचा ढिगारा सांचलेला असायचा. माझ्या ढाब्यावरसुध्दा पूर्वी चार माणसे यायची, त्यांची संख्या आता पांच सहा (आंकड्या)वर गेली आहे. त्यांना काय हवे नको ते पहायचे असते. त्या व्यापातून वेळ काढून अगदी रोजच्या रोज मिसळपाववर यायला जमले नाही आणि त्यामुळे कांही छान पदार्थांची ताजी चव घेता आली नाही. पण आपल्याला जे मिळाले नाही त्याची खंत करण्यापेक्षा जे मिळाले त्याची कदर करावी, असे मी नेहमीच स्वतःला आणि कधी एकादा ऐकणारा भेटला तर त्याला सांगत असतो.

"तुम्हाला वाचनातून काय मिळतं हो?" असा प्रश्न आपण दहा लोकांना विचारला तर त्याची निदान वीस तरी उत्तरे मिळतील, पण त्या सर्वांची गोळाबेरीज बहुधा माहिती आणि मनोरंजन यात होईल. पुढे त्यामुळे निरनिराळ्या क्षेत्रात उन्नती झाली, अनेक प्रकारचा आनंद मिळाला वगैरे त्याचे कित्येक फायदे त्यातून निघतील. मी मात्र एकादी गोष्ट समजून घेत असतांना त्या क्रियेत तल्लीन होऊन जातो आणि देहभान हरपवून टाकणारा एकादा कलाविष्कार पहात किंवा ऐकत असतांनासुध्दा त्यातून कसला तरी शोध बोध मनातल्या मनात चाललेला असतो. माहिती आणि मनोरंजन या गोष्टी मला एकमेकींपासून वेगळ्या करता येत नाहीत. मिसळपाववर मला त्या दोन्हीही मिळाल्या असे सांगता येईल.

मिपावरच्या मेनूकार्डात कांही मुख्य विभाग आहेत. त्यातल्या प्रत्येक पदार्थाला लेखनविषय आणि लेखनप्रकार यांची लेबले लावावी लागतात. अशा चौकटी आंखून त्यात बसतील असे शब्द लिहायला मला जमत नाही. तापलेल्या तव्यावर फोडून टाकलेल्या अंड्याप्रमाणे माझे लिखाण अस्ताव्यस्त पसरत जाते. त्यामुळे मुळात मला लिहायला तरी कुठे येते? असा प्रश्न कांही लोक विचारतात, तसा तो मलाही पडतो. पण मी त्याला नजरेआड खुंटीला टांगून ठेवतो आणि सुचेल तसे कीबोर्डवर बडवून घेतो. अर्थातच इतर लोकांच्या लेखनाच्या लेबलांकडे माझे लक्ष जात नाही. मी सरळ खाली लिहिलेले वाचायला सुरुवात करून देतो.

मिपाच्या सर्व विभागात 'जनातलं, मनातलं' हे माझे मुख्य खाद्य आहे. अनेक छान छान कथा, अनुभव, प्रवासवर्णने, व्यक्तीचित्रे वगैरे मला त्या विभागात वाचायला मिळाली. कांही कथा काळजाला भिडणार्‍या होत्या तर कांही गुदगुल्या करणार्‍या, कांही क्षणाक्षणाला रहस्य वाढवत नेणार्‍या तर कांही शेवटच्या एका वाक्यातच दणका देणार्‍या अशा नाना तर्‍हा त्यात होत्या. कधी कधी कल्पितापेक्षा वास्तव जास्त अद्भुत किंवा भयानक असते याचे अनुभव कोणी लिहिले, तर कोणी आपले मजेदार किस्से सांगितले. कोणी गौरवशाली भूतकाळातली एकादी गोष्ट सांगितली तर कोणी नजिकच्या भविष्यकाळात काय घडू शकते याचा अंदाज वर्तवला. वर्तमानकाळात घडत असलेल्या घटनांवरील लेखांचा प्रवाह तर धोधो वहात असतो. वर्तमानपत्रात छापून येण्यापूर्वीच एकादी महत्वाची बातमी मला मिपावर वाचायला मिळाली असेही अनेक वेळा घडले, इतके इथले सदस्य सजग आणि तत्पर आहेत. समुद्रकिनारा ते बर्फाच्छादित पर्वतशिखरे, प्राचीन वाडे ते आलीशान पॅलेसेस, तसेच मंदिरे, चर्च, म्यूजियम वगैरे कांही निसर्गसौंदर्याने नटलेल्या तर कांही मानवाची किमया दाखवणार्‍या अशा अनेक स्थळांची सचित्र वर्णने वाचायला आणि पहायला मिळाली. कांही लेखातून मधुर गायनाचे दुवे मिळाले. अशा प्रकारे हे सदर वाचणे ही एक मेजवानी असायची. कांही चित्रकारांच्या कुंचल्यातील अप्रतिम जादू आणि छायाचित्रकारांच्या कौशल्याची कमाल वेगळ्या कलादालनात पहायला मिळाली.

काथ्याकूट या सदरात होणार्‍या चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी संयोजकांची इच्छा आहे! त्यानुसार कधी कधी एकाद्या विषयावर मुद्देसूद चर्चा घडते. त्यातून त्या विषयाचे आपल्याला आधी माहीत नसलेले पैलू समोर येतात. "वादे वादे जायते तत्वबोधः।" या उक्तीनुसार आपल्या मनातल्या कांही अस्पष्ट संकल्पनांना आकार येतात, त्याचे रेखाचित्र असेल तर त्यात रंग भरले जातात, चित्र असेल तर त्याला उठाव येतो. पण कांही वेळा मुळात टाकलेल्या काथ्याकडे दुर्लक्ष होते आणि लोक आपापल्या सुतळ्या, दोरखंड, काड्या वगैरे त्यात घालून कुटत बसतात. अशा काथ्याकुटासाठी काथ्यांचे वेगवेगळे धागे न टाकता एक खलबत्ताउखळमुसळ यंत्र अखंड चालत ठेवले आणि ज्यांना जे पाहिजे ते जितके हवे तितके बारीक किंवा भरड कुटू दिले तरी फारसा फरक पडणार नाही. मात्र त्याचा खाट सहन होत नसेल तर हातातला उंदीर तिकडे जाण्यासाठी चुळबुळ करायला लागला की आधी कीबोर्डाचे कनेक्शन काढून ठेवणे बरे असते अशी सावधगिरी बाळगण्याची सूचना करावी असे वाटते.

आजची खादाडी हा तर मिसळपावचा लाडका विषय असायलाच पाहिजे. मुखपृष्ठावरच मुळी इतके छान छान फोटो टाकलेले असतात की ते पाहतांना तोंडाला पाणी सुटते. इतर विभागातले लाक्षणिक अर्थाने 'पदार्थ' वाचून मन तृप्त होते, पण पाककृती मात्र प्रत्यक्ष करून आणि जिभेने चाखून पहाव्याशा वाटतात. आमच्या किचनलँडचा फक्त टूरिस्ट व्हिसा मला मिळालेला असल्यामुळे तिथे गेल्यावर लुडबूड करता येत नाही. शिवाय गोड, तिखट, खारट, आंबट, तेलकट, तुपकट वगैरे सगळ्या चविष्ट पदार्थांच्या आणि उत्तेजक पेयांच्या सेवनावर नतद्रष्ट डॉक्टरांनी नियंत्रण घालून ठेवले आहे. इंटरनेटमधून जशी छान चित्रे पहायला मिळतात, सुरेल संगीत ऐकायला मिळते त्याचप्रमणे खाद्यपदार्थ तयार होतांना पसरणारा घमघमाट आणि तयार झाल्यावर त्याला आलेली चव यांचा आस्वाद दुरून घेता येण्याची सोय कधी तरी होईल असे मनातले मांडे मी मनात खात असतो.

"जे न देखे रवी ते देखे कवी" असे म्हणतात. त्याप्रमाणे जिथे सूर्याचा प्रवेश होत नाही अशा आभाळात हे महानुभाव आपल्या कल्पकतेचे पंख लावून स्वैर भ्रमण करत असतात. त्यांचे शेपूट धरून त्यांच्याबरोबर जायला मिळाले तर आपल्याला सुध्दा त्याचे नेत्रदीपक दर्शन घडू शकते. पण कधी कधी जे कवीला दिसते ते पाहण्याइतकी क्षमता आपल्या दृष्टीत नसते किंवा आपल्या पंखातले बळ कमी पडते आणि आपण जमीनीवरच खुरडत राहतो. कधी तर आपण त्यांच्या सोबतीने आकाशात उडण्याऐवजी पार पाताळात जाऊन पोचलो आणि कवीला न दिसलेले आपल्याला दिसायला लागले तर पंचाईत होते. अशा अमूर्त अगम्य गोष्टींविषयी मला फारसे आकर्षण वाटत नसल्यामुळे त्या प्रांतात मी क्वचितच जातो. त्यातला विडंबन हा प्रकार समजायला सोपा आणि मजेदार वाटतो. मूळ कविता आपल्या ओळखीची असेल, त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे विडंबन करणार्‍याला ती पूर्ण समजली असेल, त्यातले वृत्त, छंद वगैरे व्यवस्थितपणे सांभाळले गेले असेल आणि मूळ कवितेची आठवण करून देणारे महत्वाचे शब्द किंवा ते ध्वनित करणारे तत्सम शब्द वारंवार येत राहिले तर ते विडंबन मस्त वाटते. नुसतेच एका गाण्याच्या चालीवर दुसरे गाणे रचले तर ते विडंबन न वाटता एक स्वतंत्र काव्य होते आणि त्यातल्या काव्यगुणांप्रमाणे त्याचे मूल्यमापन होते.

प्रत्यक्षातील बहुतेक हॉटेलांत ग्राहकांनी मागवलेले पदार्थ वेटर आणून देतो तर बर्‍याचशा कँटीन, कॅफेटेरिया वगैरेंमध्ये स्वयंसेवा असते. मिसळपावच्या हॉटेलात वाढपी तर नाहीतच, स्वैपाकीसुध्दा नाहीत. एक अद्ययावत साधनांनी युक्त असे स्वयंपाकघर आहे. इथे येणारे ग्राहकच आपापला शिधा घेऊन येतात, वाटल्यास इतर ग्राहकांकडून कांही वस्तू मागून घेतात किंवा ढापतात आणि पाकसिध्दी करून पदार्थ तयार झाल्यावर ते काउंटरवर आणून ठेवतात. इतर सदस्य आणि पाहुणे त्याचा मुक्तपणे आस्वाद घेतात. कांही ग्राहकांचे इतरांवर बारीक लक्ष असते आणि ते त्यांना परोपरीने मदत करत असतात. माझ्यासारख्या नवशिक्याने केलेला पदार्थ धांदरटपणामुळे अर्धाकच्चा राहिला तर तो खरपूस भाजून देतात, त्यात ढेकळे राहिली तर ती फोडून त्यांचा चकणाचूर करतात, दिव्यदृष्टी प्राप्त झालेल्या कांही एक्स्पर्ट लोकांना चुकून आलेले खडे आणि न शिजलेले गणंग पटकन दिसतात, कांही सज्जन खोवलेला नारळ, चिरलेली कोथिंबीर, बारीक शेव वगैरे त्यावर पसरतात आणि बाजूला लिंबाची फोड, टोमॅटोचे काप वगैरे ठेऊन छान सजवून देतात. इथली संचालक मंडळीसुध्दा जसा पदार्थ असेल त्याप्रमाणे त्यावर खमंग फोडणी देऊन, तुपाची धार धरून किंवा पिठीसाखर पसरून त्याची गोडी वाढवतात. अधून मधून ते ग्राहकाचा वेष धारण करून येतात आणि ठेवणीतले चमचमीत पदार्थ तयार करून हॉटेलाचे स्टँडर्ड उंचावतात.

चितळे बंधूंची आंबा बर्फी किंवा बाकरवडी, हलदीरामची सोनपापडी, आलू भुजिया यासारखे सुप्रसिध्द खाद्यपदार्थ किंवा घरी भेट म्हणून आलेले मिठाईचे पुडे इकडे घेऊन यावे असेही कोणाला वाटते. कांही लोक दुसर्‍या चांगल्या हॉटेलातून तिथल्या खाद्यपदार्थांचे पार्सल बांधून आणण्याचा विचार करतात. हे सारे पदार्थ चविष्ट असले तरी मिपाच्या योग्य अशा धोरणाप्रमाणे बाहेरचे खाद्यपदार्थ इथे आणणे वर्ज्य आहे. तसा रीतसर बोर्डसुध्दा लावलेला आहे. पण उत्साहाच्या भरात तिकडे लक्ष न गेल्यामुळे किंवा ते न दिल्यामुळे क्वचित कांही लोक तसे करतात. ते उघडकीला आल्यावर कांही लोक सौम्य शब्दात त्याची जाणीव करून देतात, तर कांही लोक "परवा आम्हाला नाही म्हंटलं होते, आज यांनी केलेलं कसं चालतं ?" वगैरे अवघड प्रश्न विचारून त्यावर वाद घालतात. माझ्यासारखे कांही सदस्य आपापले वेगळे ठेलेसुद्धा चालवतात. त्यात एकादा चांगला पदार्थ बनून गेला तर त्याची चव इतर लोकांनी चाखून पहावी यासाठी कधी कधी ते सदस्य तो पदार्थ  इथे तसेच दुसर्‍या कांही ठिकाणीसुध्दा मांडतात. स्वतः तयार केलेला पदार्थ इथे आणून मांडायला इथल्या नियमांप्रमाणे परवानगी आहे आणि मला त्यात कांही गैर वाटत नाही. पण "आपले उष्टे खरकटे पदार्थ इथे आणून ठेवायला या लोकांना लाजा कशा वाटत नाहीत ?" असा ओरडा जेंव्हा आंतल्या गोटातून एकदा झाला तेंव्हा मात्र मी चपापलो. त्यानंतर त्याचा ऑफीशिअली खुलासा झाला असला तरी त्यावरून समजायचे ते समजून घेऊन मी आपल्यापुरता एक निर्णय मनाशी घेतला होता. पण ती कांही भीष्मप्रतिज्ञा नव्हती की ते जाहीर आश्वासन नव्हते, त्यामुळे नंतर ते विसरून गेलो. आज सिंहावलोकन करतांना त्याची आठवण झाली. हा लेख मात्र खास मिसळपावासाठीच लिहिला गेला आहे याची ग्वाही द्यायला हरकत नाही.

बहुतेक उडप्यांच्या हॉटेलात दारापाशीच एका चांदीच्या चकाकणार्‍या देव्हार्‍यात एक सुंदर मूर्ती ठेवलेली असते किंवा एका स्वामीचा फोटो लावून त्याला ताज्या फुलांचा हार भक्तीभावाने घातलेला दिसतो. मिसळपावच्या मुखपृष्ठावर सुध्दा आराध्य दैवतांची किंवा साधुसंतांची सुंदर चित्रे लावून ते मंगलमय केलेले असते. पण मधूनच कोणी भाबडा (वाटणारा) भक्त एका जगद्वंद्य महात्म्याचा फोटो एका भिंतीला चिकटवून त्याला उदबत्ती ओवाळतो. त्यानंतर दोघेतीघे येतात आणि हिरव्या मिरचीची चटणी, चिंचेचा घोळ, हॉट अँड सॉवर सॉस वगैरेमध्ये बुडवलेली बोटे त्या चित्राला पुसतात. ते पहायलाही कांही लोकांना मजा वाटते. "पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना" असे म्हणतात ना!

मिसळपावाच्या हॉटेलातल्या ग्राहकांना एकेक खण देऊन ठेवले आहेत. एकादा खास पदार्थ करून त्यातल्या कोणाच्याही खणात ठेवलेल्या बशीत घालायची सोय केलेली आहे. कांही ग्राहक त्याचा फायदा रोज घेत असतात. मध्यंतरी एकदा एका सदस्याने भरून ठेवलेल्या अमृतकुंभाचे रेखाचित्र दुसर्‍या एका ग्राहकाने त्याला न विचारता काढले, त्यातल्या अ या अक्षरावर फुली मारली आणि त्याच्या चारी बाजूंना काळ्या रंगाची चौकट काढून ते चित्र आपल्या खणात लावून ठेवले. ते पाहून पहिल्या सदस्याच्या अंगाचा तिळपापड झाला आणि या दोन सदस्यात कांही तिखट व कडू पदार्थांची देवाणघेवाण झाली म्हणे. त्याची कुणकुण कानावर आल्यामुळे अशा प्रकारच्या समांतर चर्चा इथे चालतात हे मला समजले. आपल्या बशीत पडलेले पण न आवडलेले पदार्थ काढून कचर्‍याच्या पेटीत टाकायची सोय आहे. "आज आपण आपली बशी साफ केलीत कां?" अशी आठवण एक सन्मान्य सदस्य सर्वांना रोज करून देत असतो. काउंटरवर ठेवलेले सगळे सुग्रास पदार्थ घ्यायलाच मला वेळ पुरत नाही. त्यामुळे इतर कोणाचे बंद खण उघडून त्यातल्या बशांत काय पडले आहे हे पहाण्याचा प्रयत्न मी कधी करत नाही.

जिवश्चकंठश्च मैत्री असलेले कांही ग्राहक एकमेकांना भेटण्यासाठी या हॉटेलात नेहमी येतात. अर्थातच त्यांच्या गप्पागोष्टी, थट्टामस्करी, उखाळ्यापाखाळ्या वगैरे मस्त रंगतात. या गुजगोष्टी आपापसात करण्यासाठी स्पेशल फॅमिली रूम नसल्यामुळे ते सर्वांसमक्षच चालते. जुन्या काळातल्या इंग्रजी किंवा हिंदी सिनेमातला एक सीन ते पाहतांना माझ्या डोळ्यासमोर येतो. एक जंगी पार्टी चाललेली असते, सारी माणसे छान छान पोशाख करून तिथे आलेली असतात, अचानक त्यातला एकजण हातातला केक दुसर्‍याच्या तोंडावर मारतो, ते पाहून तिसरा चौथ्याकडे फेकतो, पण तो हा हल्ला चुकवतो त्यामुळे तो पांचव्याला लागतो. त्यानंतर सहावा, सातवा, आठवा असे करत पार्टीतले सारेच लोक या खेळात सामील होतात. मधूनच एकादा चार्ली चॅपलिन किंवा राजेंद्रनाथ गालाला लागलेले क्रीम बोटांनी पुसून चाटून घेतो. ते दृष्य पाहतांना सर्व प्रेक्षकांची हंसून हंसून मुरकुंडी वळते.

अशा अनेक गंमतीजंमती मिपावर चाललेल्या असतात. तिथे आज आलेला लेख उद्या इतिहासकाळात जातो आणि परवा तो मुद्दाम शोधून काढावा लागतो इतक्या प्रचंड गतीने ते येत असतात. त्यातले सारेच वाचणे जमत नाही. पण आपल्या आवडीनुसार हवे ते निवडता येते. एकंदरीत पाहता मला हे स्थळ आवडले, शक्य तितक्या वेळा इथे यावे असे वाटले आणि पुढेसुध्दा मी इथे येत रहाणारच आहे असे म्हणतो.

- आनंद घारे

Thursday, May 02, 2019

मराठीतली विरामचिन्हे (. , ? ! ' ")



माझे शिक्षण मराठी माध्यमात झाले. अर्थातच मी आधी मराठी भाषा शिकलो. मला मराठीमधली अक्षरे, शब्द, वाक्यरचना, विरामचिन्हे वगैरे समजायला लागली आणि मी त्या भाषेतील पुस्तके वाचायला लागलो. त्यानंतर अनेक वर्षांनी मी मराठीमधून इंग्रजी शिकलो आणि त्या भाषेतले वाचन आणि लेखन सुरू केले. या दोन्ही भाषांच्या लिपी अगदी भिन्न आहेत. मराठीमध्ये कखगघ या सारखी अनेक व्यंजने आहेत आणि त्यांना काना, मात्रा आणि वेलांट्या लावून बाराखड्या केल्या असल्याने अक्षरशः शेकडो निरनिराळी अक्षरे आहेत, त्याशिवाय जोडाक्षरे निराळीच. इंग्रजीत फक्त २६ अक्षरे आहेत आणि स्पेलिंग हा एक वेगळा प्रकार आहे. असे असले तरी पूर्णविराम (.), स्वल्पविराम,(,) प्रश्नचिन्ह (?), उद्गारवाचक चिन्ह (!), कंस () वगैरेंसाठी मात्र तीच चिन्हे कां असतात या एका गोष्टीचे मला आश्चर्य वाटायचे. इतकेच नव्हे तर ती इंग्रजांनी आपल्याकडून उचलली असतील का असेही वाटायचे.

मराठी भाषेचा इतिहास पहायला गेला तर तो अनेक शतकांचा आहे आणि संस्कृत भाषेपासून सुरुवात करायची झाली तर तो हजारो वर्षांचा म्हणावा लागेल. शिलालेख, ताम्रपट, भूर्जपत्रे, खलिते, बखरी वगैरेंमधून इतिहासाबद्दल माहिती मिळते. पण मी पुराणवस्तूसंग्रहालयांमध्ये किंवा पुरातन देवळे, किल्ले वगैरे जागी असले जितके अवशेष पाहिले त्यातून मला तरी काही बोध झाला नाही. एक तर ती लिपीच माझ्या ओळखीची नसायची, असलीच तरी त्यातले सगळे शब्द सलग लिहिलेले असायचे, त्यातून ते वेगळे करून काढले तरी ते अनोळखी असायचे आणि एकादा ओळखीचा शब्द मिळाला तरी त्याचा संदर्भ लागायचा नाही. म्हणजे माझ्या अक्कलखात्यात काहीही भर पडायची नाहीच. माझ्या लहानपणी आमच्या घरी काही जुन्यापुराण्या जीर्ण जर्जर पोथ्या होत्या. त्यांची सगळी पाने सुटी असायची आणि दोन चपट्या लाकडी फळ्यांमध्ये ठेवलेली असायची. आजोबा, पणजोबांच्या काळातले काही दस्तऐवज होते ते मोडी लिपीत होते. मी त्या पोथ्या एक एक अक्षर करून आईला वाचून दाखवत असे आणि हळू हळू मलाही त्या थोड्या समजायला लागल्या होत्या. जुन्या काळातल्या मोडी दस्तऐवजाला हात लावायला मुलांना परवानगी नव्हती.

या सगळ्या जुन्या काळातल्या मराठी लेखनामधून मला एक गोष्ट दिसली की यात कुठेही विरामचिन्हे नसायची. सगळे संतवाङमय तर पद्य रूपातच होते. त्यात प्रत्येक चरणाच्या शेवटी एक दंड किंवा उभी रेघ आणि श्लोक किंवा ओवीच्या अखेरीला दोन उभ्या रेघा मारून त्यांना वेगळे करत असत. पण पद्यातली वाक्यरचना कर्ता, कर्म, क्रियापद या क्रमानुसार असण्याची गरज नसते. त्यामुळे मराठी गद्य ज्या स्वरूपात वाचण्याची आपल्याला संवय आहे किंवा ज्या स्वरूपात हा लेख लिहिला आहे अशा प्रकारचे लेखन इतिहासकाळात होत नसावे. त्या काळातल्या लेखनाचे काही नमूने वरील चित्रात दिले आहेत. यातले हजार बाराशे वर्षे जुने शिलालेख वाचून ते मराठी भाषेतलेच आहेत असे ठामपणे सांगू शकणाऱ्या पंडितांचे मला प्रचंड कौतुक वाटत आले आहे. 

आपल्या ओळखीची मराठी भाषासुद्धा निदान दीडशे वर्षे तरी जुनी आहेच कारण टिळक - आगरकर यांचे लेख किंवा देवल - किर्लोस्कर यांची नाटके या स्वरूपात आहेत. मग हे प्रत्येक शब्द सुटा लिहिलेले आणि विरामचिन्हांनी युक्त असलेले मराठी भाषेतले लेखन कधीपासून सुरू झाले असेल? पूर्वीच्या काळी अशा प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी खास वाचनालयांमध्ये जाऊन विशिष्ट पुस्तके धुंडाळावी लागायची आणि हे माझ्यासाठी शक्यच नव्हते. पण आता गगलबुवांच्या कृपेमुळे कसलीही पायपीट न करता घरबसल्या बरीच माहिती अगदी सहजपणे आणि फुकटात उपलब्ध होते.  त्यावरून माहिती घेता समजले की या बाबतीतसुद्धा आपल्याला इंग्रज साहेबांचे आभार मानायला हवेत.

आपल्याकडल्या पेशवाईचा ऱ्हास चालू असतांनाच इंग्रजांनी मुंबईला आपले ठाणे वसवले होते आणि इथला प्रदेश गिळंकृत करायचा उद्योग सुरू केला होता. त्या काळात भारतात पाठवल्या जाणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांना इंग्लंडमध्येच मराठी भाषेचे धडे देऊन पाठवत असत. त्यांच्यातल्या मोल्सवर्थ, कँडी आदि काही लोकांना मराठी भाषेची गोडी लागली आणि त्यांनी या भाषेतला शब्दकोष, व्याकरण इत्यादींवर मन लावून आणि कंबर कसून काम केले. त्यांनीच युरोपियन भाषांमध्ये प्रचलित असलेली विरामचिन्हे मराठीत वापरायची पहिल्यांदा सुरुवात केली आणि तशा प्रकारे काही पुस्तके लिहिली. यामागे मराठीभाषिक लोकांना इंग्रजी शिकवून आपल्या बाजूला वळवणे आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे ही त्यांची उद्दिष्टे असली तरी त्यांच्या प्रयत्नांमुळे गद्य मराठी लेखनाला एक नवे स्वरूप प्राप्त झाले. छापखाने सुरू झाल्यामुळे त्याचा प्रसार झपाट्याने होण्याला मदत झाली. त्याच काळात होऊन गेलेले दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी या इंग्रजांच्या कल्पना उचलून घेऊन आणि त्यांचा उपयोग करून घेऊन मराठी भाषेतले व्याकरण लिहिले आणि गद्य लेखन अशा प्रकारे लिहिण्याचा जो पायंडा पडला तो आपण दीडशे वर्षे पाळत आलो आहोत. स्वातंत्र्यानंतर सरकारी प्रयत्नामधून काही समित्या स्थापन झाल्या आणि त्या मराठी भाषेच्या वापराबद्दल काही सूचना देत असतात पण त्याच्या स्वरूपात मूलभूत बदल होण्याची शक्यता मला तरी दिसत नाही. किंबहुना तसे करण्याचे काही कारणही नाही.