Friday, July 31, 2009

तेथे कर माझे जुळती - भाग ५ श्रीमती गंगूबाई हंगल


मी शाळेत असतांना एकदा आमच्या लहानशा गांवात पं.भीमसेन जोशी यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला होता. त्या वेळी त्यांचे गायन ऐकायला किंवा त्यांना पहायला सारा गांव त्या जागी लोटला होता आणि सगळे लोक कशासाठी तिकडे जात आहेत ते पहायला जाऊन मीसुध्दा गर्दीतून वाट काढत मंचाच्या अगदी जवळ जाऊन बसलो होतो. हा एक अपवाद वगळला तर माझ्या लहानपणी मी शास्त्रीय संगीत कधी ऐकल्याचे मला आठवत नाही. शास्त्रीय संगीतावर आधारलेली नाटकसिनेमातली गाणी मात्र मला विशेष आवडत असत. त्यातल्या आलाप ताना तेवढ्या थोड्या ओळखीच्या होत्या. पुढे हॉस्टेलच्या मेसमधल्या रेडिओवर बहुधा रेडिओ सिलोन किंवा विविधभारती यातले एकादे स्टेशन लावलेले असायचे. एकादी मोठी घटना होऊन गेली असली तर कोणीतरी त्यावर बातम्या लावायचा. एकदा असेच आम्ही चारपाच मित्र जेवण आटोपल्यानंतर रेडिओशेजारी कोंडाळे करून बसलो होतो. स्टेशन बदलण्याच्या बटनाशी चाळा करता करता अचानक एक दमदार तान ऐकू आली. "अरे व्वा! हा कोण बुवा आहे बुवा?" आमच्यातला एकजण उच्चारला. त्यातला दुसरा 'बुवा' आमच्यातल्या एका मुलाला उद्देशून होता. त्याने शाळेत असतांना संगीताच्या एकदोन परीक्षा देण्यापर्यंत मजल मारली होती आणि अमक्या गाण्याचा तमका राग आहे वगैरे माहिती सांगून तो आमच्यावर शाइन मारायला पहात असे.
तो लगेच म्हणाला, "अरे बुवा काय म्हणतोय्स? या आपल्या गंगूबाई असणार."
आम्ही जेवढे म्हणून हिंदी वा मराठी सिनेमे पाहिले होते त्यातले 'गंगूबाई' नावाचे पात्र भांडी घासणे, लादी पुसणे आणि क्वचित कधी लावालाव्या करणे याव्यतिरिक्त आणखी कांही करतांना आम्ही पाहिले नव्हते. त्यामुळे सर्वांनात हंसू फुटले.
"अरे ए, तुला बुवा म्हंटलं म्हणून आम्हला शेंडी लावतोस का रे?" कोणीतरी विचारले. यावरून दोघांची जुंपली आणि "तुझी माझी पैज" पर्यंत गेली. अखेर "जो कोणी हरेल त्याने सर्वांना चहा पाजायचा." असा तोडगा एका हुषार मुलाने सुचवला आणि अर्थातच सर्वांनी तो एकमताने मंजूरही करून टाकला. एक कप चहासाठी सर्व मुलांनी ते गायन शेवटपर्यंत ऐकले. मेसच्या इतिहासात प्रथमच त्या रेडिओमधून शास्त्रीय संगीताचे स्वर बाहेर पडत असावेत. गायन संपल्यानंतर निवेदिकेने घोषणा केली. त्यात "अभी आप सुन रहे थे श्रीमती गंगूबाई हंगलका मधुर गायन ..." वगैरे सांगितले तेंव्हा मी आयुष्यात प्रथमच त्यांचा आवाज आणि त्यांचे नांव दोन्ही ऐकले.
लग्न करून बि-हाड थाटल्यानंतर रेडिओ, टेपरेकॉर्डर, टेलिव्हिजन वगैरे सगळ्या वस्तू यथावकाश येत गेल्या आणि त्यातून आमचे सांगीतिक जीवन सुरू झाले. यात माझा सहभाग श्रवणभक्तीपुरताच मर्यादित होता, पण आता सुगम संगीताच्या सोबतीला शास्त्रीय संगीत ऐकणे सुरू झाले आणि त्याची गोडी वाटायला लागली. हळूहळू त्याचे कार्यक्रम, मैफली वगैरेंना जाऊ लागलो. त्यामुळे त्यातले दादा लोक म्हणजे पंडित, बुवा, उस्ताद आणि खानसाहेब वगैरेंची नांवे परिचयाची झाली. रेडिओ ऐकतांना किंवा टीव्हीवर पाहतांना आभाळातल्या नक्षत्रांसारखे वाटणारे हे कलाकार टाटा थिएटर किंवा नेहरू सेंटर सारख्या ठिकाणी जमीनीवर अवतरले तरी वलयांकितच दिसतात. मात्र चेंबूरचे बालविकास मंदिर किंवा दादर माटुंगा कल्चरल सेंटरसारख्या जागी लवकार गेल्यास त्यांना अगदी दहा बारा फुटांच्या अंतरावरून पहायला मिळते. थोडा उत्साह दाखवला तर कार्यक्रम झाल्यानंतर पुढे जाऊन त्यांना चरणस्पर्श करता येतो. पं.कुमार गंधर्व, पं.भीमसेन जोशी, पं.जसराज, किशोरीताई वगैरेंच्या जोडीनेच त्या काळात गंगूबाईंचे नाव आदराने घेतले जात असे. त्यांचे गायन ऐकण्याची संधी रसिक श्रोते चुकवत नसत. या सगळ्या दिग्गजांचे गायन ऐकण्यासाठी आम्हीसुध्दा दूरदूरच्या सभागृहात जात असू.
एकदा योगायोगाने आगगाडीच्या डब्यात पं.शिवानंद पाटील आणि सौ.योजना शिवानंद या जोडप्याची भेट होऊन ओळख झाली आणि ती वाढत गेली. त्यानंतरची कांही वर्षे योजना प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही घरचे कार्य समजून हजर रहात होतो. त्या वेळी प्रमुख कलाकारांचा सत्कार तर होत असेच, त्या निमित्याने कांही अन्य आदरणीय मंडळींचा सत्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले जात असत. यामुळे अनेक मान्यवर कलाकारांना जवळून पाहण्याची, त्यांच्याबरोबर दोन शब्द बोलण्याची संधी मला मिळाली. अशाच एका प्रसंगी मी पहिल्यांदा गंगूबाईंना क्षणभरासाठी भेटलो होतो.
योजना प्रतिष्ठानतर्फे दर वर्षी पं.बसवराज राजगुरू स्मृतीदिनानिमित्य कर्नाटकातल्या एकदोन कलाकारांच्या गायन वादनाचा कार्यक्रम ठेवला जात असे. त्यात सन २००१ मध्ये श्रीमती डॉ.गंगूबाई हंगल यांच्या गायनाचा कार्यक्रम ठेवला होता. हा समारंभ बेळगांवला झाला. त्यासाठी आम्ही सारेजण आदल्या दिवशी तिथे जाऊन पोचलो. हुबळीहून गंगूबाईसुध्दा आल्या होत्या. त्यांच्या राहण्यासाठी वेगळी व्यवस्था केली असली तरी बराच वेळ त्यासुध्दा आमच्यातल्याच एक बनून आमच्यासोबत राहिल्या. घरातल्या मोठ्या माणसाच्या मायेने सर्वांची विचारपूस करत होत्या, हास्यविनोद करून खळखळून हंसत होत्या. आपण एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या सान्निध्यात बसलो आहोत असे कोणाला वाटू देत नव्हत्या, कसल्याही प्रकारची प्रौढी त्यांच्या बोलण्यात नव्हती किंवा त्यांच्या जोरकस गायनात जो आवेश दिसतो त्याचाही मागमूस नव्हता. उत्तर कर्नाटकात घरोघरी बोलली जाते तशा साध्या सोप्या कानडी बोलीभाषेत सारे संभाषण चालले होते. मधून मधून कानडीमिश्रित मराठीसुध्दा त्या बोलायच्या. मीसुध्दा द्विभाषिक असल्यामुळे मला समजायला कसली अडचण पडली नाही. दुसरे दिवशी त्यांनी केलेले गायन तर मंत्रमुग्ध करणारे होतेच, त्या दिवशी झालेली त्यांची भेट अधिक प्रभाव पाडणारी होती.

पं.भीमसेनजी आणि स्व.आठवले शास्त्री यांच्याबद्दल लिहितांना मी त्यांच्या कर्तृत्वाबद्दल लिहिले नव्हते कारण यापूर्वी अनेक वेळा त्याविषयी लिहिले गेले आहे. गंगूबाईंच्याबद्दल माझ्या वाचनात जेवढे आले ते बहुतेक इंग्रजीत होते. मराठी भाषेतसुध्दा लेख आले असतील, त्यांना श्रध्दांजली वाहणारा अग्रलेक मी पाहिला आहे, पण कदाचित तो सर्वांनी वाचला नसल्यास वाचकांना माहिती व्हावी यासाठी त्यांच्या जीवनातल्या कांही ठळक गोष्टी नमूद करत आहे. त्या कर्नाटकातल्या धारवाड जिल्ह्यात जन्माला आल्या आणि त्यांनी जगभरातल्या श्रोत्यांची मने जिंकली असली तरी बहुतेक वेळी त्यांचे वास्तव्य हुबळी धारवाडच्या परिसरातच राहिले. गंगूबाईंच्या मातोश्री कर्नाटक संगीतात पारंगत होत्या, पण त्यांनी गंगूबाईंना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची तालीम द्यायचे असे ठरवले. किराणा घराण्याचे प्रख्यात गायक पं.रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाई गंधर्व यांचेकडून त्यांनी हिंदुस्तानी संगीताचे शिक्षण घेतले. पण त्याच्या खूप आधी म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षीच गंगूबाईंनी बेळगाव येथे भरलेल्या काँग्रेसच्या संमेलनात स्वागतगीत गाऊन सर्वांची वाहवा संपादन केली होती. गुरूकडून घेतलेले शिक्षण त्यांनी आत्मसात केलेच, त्याला आपल्या प्रतिभेची जोड देऊन त्याचे अप्रतिम सादरीकरण केले आणि त्यातून नांवलौकिक मिळवला. त्या ज्या काळात संगीताच्या क्षेत्रात आल्या त्या काळात स्त्रियांना त्यात मानाचे स्थान नव्हते, उलट त्यांची अवहेलनाच जास्त होत असे. ते सर्व हालाहल पचवून त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि सर्व विरोधकांना व निंदकांना पुरून उरल्या.

गंगूबाईंनी जेमतेम प्राथमिक शालेय शिक्षण घेतले होते, पण त्यांना चार विद्यापीठांनी डॉक्टरेटची पदवी देऊन सन्मानित केले. एवढेच नव्हे तर धारवाड विद्यापीठात त्यांनी अनेक वर्षे संगीतावर अध्यापन केले आणि त्याच्या सिनेटच्या त्या सदस्या होत्या. अनेक संस्थांनी त्यांना पन्नासावर बिरुदावली बहाल केल्या. त्यात संगीत नाटक अकादमी या सर्वोच्च संस्थेचाही समावेश होतो. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण ही पदके दिली. एकंदर नऊ पंतप्रधान आणि पाच राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला आहे.

त्यांनी काळावर जवळ जवळ मात केली होती. मी पहिल्यांदा त्यांना ऐकले तेंव्हाच त्या सत्तरीला आल्या होत्या पण आवाज खणखणीत आणि सूर अगदी पक्के होते. त्यांचे शेवटचे गाणे ऐकले तेंव्हा तर त्या नव्वदीला आल्या होत्या, तरीसुध्दा आवाजात कंप नव्हता. त्यांना अधून मधून विश्रांती देण्यासाठी त्यांच्या कन्यका कृष्णाबाई बहुतेक वेळी त्यांची साथ करत असत. त्यांच्या संगीतविश्वातल्या वारस समजल्या गेलेल्या कृष्णाबाई दुर्दैवाने त्यांच्या आधीच चालल्या गेल्या, त्या त्यांच्या वयाची पंचाहत्तरी झाल्यानंतर. त्यानंतर गेल्या कांही वर्षात गंगूबाईंचे नांव बातम्यांमध्ये येत नव्हते. एकदम त्या अत्यवस्थ असल्याचे वृत्त आले आणि त्यापाठोपाठ त्यांच्या देहावसानाचीच बातमी आली. काळ आणखी तीन चार वर्षे थांबला असता तर वयाचे शतक झळकवणारी एक थोर व्यक्ती आपल्याला पहायला मिळाली असती.

Sunday, July 26, 2009

लांडगे आले रे .... आणि परत गेले

बावीस जुलैला सूर्याला लागलेले खग्रास ग्रहण शंभर वर्षातले सर्वात मोठे होते, तसेच चोवीस जुलैला मुंबईच्या समुद्राला शंभर वर्षातली सर्वात मोठी भरती आली होती असे त्या त्या विषयांमधले तज्ज्ञ सांगतात. या दोन्ही गोष्टी आपल्या छोट्या आयुष्यात आपल्याला पहायला मिळाव्यात हे आपले केवढे मोठे भाग्य? असे वाटण्याची शक्यता आहे. त्यांच्यासंबंधीच्या बातम्या, लेख आणि चर्चा वगैरे गोष्टी गेल्या तीन चार महिन्यांपासून सर्व प्रसारमाध्यमांवर येऊ लागल्या होत्या. हळू हळू त्यांची संख्या वाढत गेली आणि तमाम जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल उत्कंठा निर्माण करून ती पध्दतशीरपणे वाढवत नेली गेली. निसर्गातल्या त्या अद्भुत घटना प्रत्यक्ष घडत असतांना तर अनेक वाहिन्यांवरून त्यांचे थेट प्रक्षेपण चालले होते. एका चॅनेलवर 'जल, थल और आकाश' यामधून सूर्यग्रहण कसे दिसते ते पहाण्यासाठी तीन जागी कॅमेरे लावले होते तर भारतातल्या आणि परदेशातल्या अनेक ठिकाणांवरून दिसणा-या ग्रहणाचे दर्शन इतर कांही चॅनेलवर घडवले जात होते. त्याचा 'आँखो देखा हाल' सांगत असतांना अशा प्रकारच्या वेगळ्या विषयावर काय नवे बोलावे असा प्रश्न निवेदकांना पडत असावा. त्यामुळे पुन्हा पुन्हा तीच तीच चित्रे दाखवून तीच तीच वाक्ये बोलली जात होती. आपण कांही तरी अचाट, अघटित, अविस्मरणीय असे पहात आहोत असा भास निवेदकांच्या बोलण्यातून केला जात होता, पण चित्रे पाहतांना तसे वाटत नव्हते. त्याला कंटाळलेले प्रेक्षक तर मध्ये मध्ये कमर्शियल ब्रेक आल्यामुळे सुखावत होतेच, वैतागलेल्या निवेदकांनासुध्दा हायसे वाटत असेल. "अमक्या सेलफोनवर बोलता बोलता चालत रहाण्यात मिळालेल्या व्यायामामुळे सगळे रोगी बरे होऊन गेले आणि डॉक्टरला माशा मारत बसावे लागले." अशा प्रकारच्या 'आयडिया' पाहून मनोरंजन होत होते.
हे खग्रास सूर्यग्रहण सर्वात मोठे कशामुळे म्हणायचे तर त्याचा सहा मिनिटांहून जास्त असलेला कालावधी मोठा होता, पण भारतापासून चीनपर्यंतच्या जमीनीवरून तरी कुठूनही तो तेवढा दिसला नाही. पॅसिफिक महासागरातल्या कुठल्या तरी बिंदूवर असला तर कदाचित असेल. टीव्हीवर जेवढा दिसला तो जेमतेम दोन मिनिटांचा असेल, आणि तो जास्त असला तरी काय फरक पडणार होता? खंडाळ्याच्या घाटातून पहिला प्रवास करतांना पहिल्या बोगद्यात आगगाडी शिरते तेंव्हा अंगावर रोमांच उभे राहतात, पण त्या बोगद्याची लांबी जितकी जास्त असेल तेवढे ते जास्त नसतात. एकदा मिट्ट काळोख झाला की त्यातून बाहेर यावेसे वायते. ग्रहण लागल्यापासून ते संपू्र्ण खग्रास होतांना पाहण्यातल्या मजेत संपूर्ण काळोख होण्यापूर्वीचा एक क्षण सर्वात मोलाचा असतो, त्याचप्रमाणे काळोखातून प्रगट होणारी सूर्याच्या किरणांची पहिली तिरीप भन्नाट असते. या दोन्ही क्षणांना आकाशात 'हि-याची अंगठी' दिसू शकते. पण या दोन क्षणांच्या मध्ये असलेला अंधार किती मिनिटे टिकतो याला महत्व कशासाठी द्यायचे ते कांही कळत नाही. मला तरी हे 'शतकांतले सर्वात मोठे ग्रहण' यापूर्वी पडद्यावर पाहिलेल्या कोणत्याही खग्रास ग्रहणांपेक्षा वेगळे वाटले नाही. भारतातल्या बहुतेक भागात त्या दिवशी आकाश काळ्या ढगांनी आच्छादलेले असल्यामुळे किंवा पाऊस पडत असल्यामुळे सूर्याचे दर्शनच झाले नाही. त्यामुळे लक्षावधी लोकांनी त्याला लागणारे ग्रहण पाहण्यासाठी घेतलेली मेहनत वाया गेली. त्यांच्या मानाने टीव्हीवर पाहणारे अधिक सुदैवी होते. वाराणशी आणि चीनमध्ये ग्रहण लागतांना ते त्यांना पहायला मिळाले.
विज्ञानातले कांही धागे उचलून अज्ञान पसरवण्याचा उद्योग करणा-या कांही उपटसुंभ 'वैज्ञानिक' लोकांनी यावेळी कांही अफवा उठवल्या होत्या. खग्रास ग्रहणाच्या वेळी सूर्य आणि चंद्र हे दोघे एका रेषेत आल्यामुळे समुद्राच्या पाण्याबरोबर जमीन आणि डोंगरसुध्दा त्यांच्याकडे ओढले जातील आणि त्यामुळे महाभयानक धरणीकंप, ज्वालामुखीचे स्फोट, सुनामी वगैरे येणार असल्याचे 'शास्त्रीय'भाकित कांही लोकांनी केले होते, तर ग्रहणाचा काळ अत्यंत अशुभ असल्यामुळे या वेळी जगात अनेक प्रकारचे उत्पात होण्याचे भविष्य पोंगापंडितांनी वर्तवले होते. त्यामुळे अनेकांची घाबरगुंडी उडाली होती. ग्रहणाचा काळ जसजसा जवळ येत होता तसतशी कांही लोकांच्या मनातली उत्कंठा, कांही जणांच्या मनातली भीती आणि कांही महाभागांच्या मनातल्या तर दोन्ही भावना शिगेला पोचल्या होत्या.
त्यानंतर दोन दिवसांनी चोवीस तारखेला 'शतकांतली सर्वात मोठी' भरती येणार असल्याच्या बातमीने तर प्रसारमाध्यमांच्या जगातल्या मुंबईत नुसती दाणादाण उडाली होती. सव्वीस जुलैच्या प्रलयाची आठवण ताजी असल्यामुळे यावेळी त्याहूनही भयंकर असे कांही तरी घडणार असल्याची आशंका घेतली जात होती. सरकार आणि महापालिका कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याच्या अधिकृत घोषणा होत असल्या तरी त्यावर कोणाचाही फारसा विश्वास दिसत नव्हता. उलट पूरनियंत्रणासाठी करण्याच्या किती योजना अपूर्ण आहेत याच्याच सविस्तर बातम्या रोज प्रसारमाध्यमातून येत होत्या. भरतीच्या दिवशी दाखवण्यात येणारे 'थेट प्रक्षेपण' तर केविलवाणे होते. गेटवे ऑफ इंडिया, वरळी आणि वरसोवा या तीन ठिकाणी समुद्रात उसळत असलेल्या लाटा आणि त्या पहायला जमलेला माणसांचा महापूर आलटून पालटून दाखवत होते. नेमके काय होऊ शकेल याचा अंदाज नसल्यामुळे सावधानतेचा उपाय म्हणून उत्साही बघ्यांना समुद्राच्या जवळपास फिरकू दिले जात नव्हते. पावसाळ्यातल्या सामान्य भरतीच्या वेळीसुध्दा मरीन ड्राइव्ह आणि वरळी सी फेसच्या कठड्यावर कांही ठिकाणी समुद्रातल्या लाटांचे पाणी उडून फुटपाथवर पडते. त्यातले शिंतोडे मी अनेक वेळा अंगावर घेतलेले आहेत, कधी कधी अचानक आलेल्या उंच लाटेमुळे त्यात सचैल स्नानदेखील झाले आहे. या वेळीसुध्दा त्याच प्रकाराने पाणी उडत होते. निदान टीव्हीच्या पडद्यावर तरी मला समुद्रातल्या लाटांचे रूप कांही फारसे अजस्र दिसले नाही. ठरलेल्या वेळी भरती आली, तशी ती रोज येतेच. त्यात कांही मोठ्या लाटा येत होत्या त्यासुध्दा नेहमीच येत असतात. जेंव्हा भरतीच्या सोबतीला तुफानी वादळवारा येतो, तेंव्हा खवळलेल्या समुद्राचे जे अक्राळ विक्राळ रूप पहायला मिळते तसे कांही मला या वेळी दिसत नव्हते. या भरतीच्या वेळीच आभाळही कोसळून मुसळधार पावसाची संततधार लागली असती तर कदाचित मुंबई जलमय झाली असती. सुदैवाने तसले कांही झाले नाही. शंभर वर्षात कधीतरी पडणारा असामान्य जोराचा पाऊस सांगून येत नाही, त्यामुळे दाणादाण उडते. ही मोठी भरती येणार असल्याचे आधीपासून कळले असल्यामुळे त्याचा अनुभव घेण्यासाठी अनेक लोक आतुरतेने तिची वाट पहात होते. त्यांच्या पदरात फारसे कांही पडले असे दिसले नाही.
'लांडगा आला रे आला' या गोष्टीतला एक खट्याळ मुलगा गांवक-यांची थट्टा करण्याच्या उद्देशाने लांडगा आल्याची खोटीच आंवई उठवतो. या वेळी ग्रहण आणि भरती हे दोन बुभुक्षित लांडगे एकानंतर एक येणार असल्याचा गाजावाजा सगळ्या प्रसारमाध्यमांनी आधीपासून सुरू केला होता. आपण या लांडग्यांना कांहीही करू शकत नाही हे ठाऊक असल्यामुळे भित्रे ससे बिळात लपून बसले होते तर कांही उत्साही प्राणी त्यांना पाहण्यासाठी कुतूहलाने उंच झाडांवर चढून बसले होते. अपेक्षेप्रमाणे 'ते' आले. त्यांनी सर्वांना आपले दर्शन दिले आणि 'ते' जसे आले तसे चालले गेले. पण 'ते दोघे' मुळात लांडगे नव्हतेच. ते होते सुंदर आणि दिमाखदार काळवीट!

Tuesday, July 21, 2009

उद्याचे सूर्यग्रहण

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांचेविषयी लिहितांना सूर्यमालेची मांडणी दाखवण्यासाठी मी एक उदाहरण दिले होते. एका क्रिकेटच्या मैदानाच्या मधोमध लाल भोपळ्याएवढा सूर्य असला तर त्याच्या बाउंडरीलाईनवरून वाटाण्याएवढी पृथ्वी आणि तिच्यापासून वीतभर अंतरावर मोहरीएवढा चंद्र फिरत असतात असे त्या उदाहरणात लिहिले होते. जर त्या मैदानाची जमीन अंतर्धान पावली तर त्या वाटाण्यावर बसलेल्या सूक्ष्म जंतूला आपण स्थिरच आहोत असे वाटेल आणि स्टेडियमच्या पार्श्वभूमीवर तो तेजस्वी भोपळा जागचा हलतांना दिसेल, त्याचप्रमाणे मोहरीएवढा चंद्र आणि फुटाणा, बेदाणा, आवळा, लिंबू वगैरेंएवढे इतर ग्रहसुध्दा फिरतांना दिसतील. "प्रत्यक्षात तो भोपळा एका जागी स्थिर आहे आणि वाटाणा, फुटाणा इत्यादी सगळे त्याच्याभोवती फिरत आहेत" असे जर कोणी त्याला सांगितले तर त्याला ते खरे वाटणार नाही. त्या सर्वांची उंची, वजन, वेग असली नीरस माहिती कोणी सांगत राहिला तर तो कंटाळून त्याला दूर करेल. पण "तिकडे तो फुटाणा ताडताड उडतो आहे आणि त्याचे चटके आपल्याला बसत आहेत, इकडच्या बेदाण्यामुळे गोडवा निर्माण होतो आहे. त्या लिंबामुळे मैत्रीपूर्ण संबंधावर विरजण पडत असले तरी लवकरच आवळ्याभोपळ्याची भेट होणार आहे आणि त्यांची मोट बांधली की सगळे सुरळीत होईल." अशा प्रकारच्या सुरस गोष्टी त्याला आवडतील, त्या ऐकतांना त्याला दिलासा मिळेल आणि तो सांगणारा त्याला जवळचा वाटेल हे साहजीक आहे.
माणसांच्या जगातसुध्दा असेच कांहीसे होत असते. आपल्या सभोवती असलेली घरे, झाडे, शेते, डोंगर वगैरे सारे कांही नेहमी जागच्या जागी दिसते पण आकाशातले सूर्य, चंद्र आणि चांदण्या रोज इकडून तिकडे जातांना दिसतात. अनेक संशोधकांनी त्यांच्या फिरण्याचा सूक्ष्म अभ्यास करून त्यावरून कांही निष्कर्ष काढले, इतर अभ्यासकांनी त्यावर सखोल चर्चा करून ते मान्य केले आणि त्यातून खगोलशास्त्र विकसित झाले. त्यातल्या कांही ढोबळ गोष्टींचा समावेश शालेय अभ्यासक्रमात केल्यामुळे पाठ्यपुस्तकांतून ती माहिती आपल्यापर्यंत पोचली. पण कांही मुले ते धडे वाचतच नाहीत, कांही मुलांना ते समजत नाहीत, पटत नाहीत किंवा आवडत नाहीत किंवा पुढच्या इयत्तेत गेल्यानंतर लक्षात रहात नाहीत. त्यातल्या ज्या माहितीचा पुढील जीवनात उपयोग होतो त्याची तेवढी उजळणी होते आणि बाकीची विस्मृतीत हरवून जाते. रोजच्या जीवनाचा आधार असलेला सूर्य सर्वांना चांगला परिचयाचा असतो. विजेच्या दिव्यांच्या लखलखाटाची संवय झाल्यावर रात्रीच्या काळोखातल्या आकाशाकडे फारसे कोणी पहात नसले तरी अधून मधून अवचित नजरेला पडणारा आकर्षक चांदोबाही ओळखीचा असतो, चांदण्यांच्या गर्दीतून शनी आणि मंगळ यांना शोधून काढून त्यांची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करणारा इसम मला बरेच दिवसात भेटलेला नाही. पण रोज वर्तमानपत्रे आणि टेलीव्हिजनवर त्यांच्याबद्दल जे सांगितले जाते त्यावरून हे दोघेजण कुंडलीच्या एका घरातून दुसर्‍या घरात जात असतात किंवा कुठे तरी ठाण मांडून बसलेले असतात आणि असतील तेथून आपल्याला उपद्रव देत असतात अशी समजूत होणे शक्य आहे.
या विषयावर होत असलेल्या चर्चा मनोरंजक असतात. संशोधनातून सप्रमाण सिध्द झालेली तथ्ये बहुतेक लोकांना पटलेली आहेत असे वाटले तरी त्याच्या सपशेल विरुध्द अशा गोष्टीतसुध्दा तथ्य असेलच अशी सर्वसमावेशक भूमिका अनेक लोक घेतात तर कांही लोकांना त्यात फारसा रस नसल्यामुळे ते सगळ्यांच्या बोलण्याला हो ला हो करत असतात. कांही लोकांच्या मनात विज्ञानाविषयी अढी असते तर स्वधर्म, स्वराष्ट्र, संस्कृती वगैरेंना विज्ञानामुळे बाधा पोचते अशी तक्रार कांही लोक करत असतात. चांगल्या आणि सुशिक्षित लोकांच्या मनात असलेल्या विज्ञानाबद्दलच्या औदासिन्य, अनादर, संशय, द्वेष वगैरे भावनांचा विचार करून मी विज्ञानाची पुस्तके बाजूला ठेवली आणि फक्त साध्या डोळ्यांना जेवढे दिसते किंवा आपण पाहू शकतो तेवढीच या विषयावरील माहिती या लेखात द्यायचे ठरवले.
कांही सुदैवी लोकांना अंथरुणात पडल्या पडल्या सकाळी खिडकीतून सूर्योदय पहायला मिळतो, कांही लोकांना त्यांच्या अंगणातून किंवा बाल्कनीतून तो दिसतो आणि इतरांना त्यासाठी जवळच्या मोकळ्या मैदानात किंवा टेकडीवर जावे लागते. भल्या पहाटे उठून आकाशात पहात राहिले तर तिथल्या काळोखाचा गडदपणा हळूहळू कमी होत जातो, तसतशा लुकलुकणार्‍या चांदण्या अदृष्य होत जातात. आकाशात धूसर प्रकाश पसरतो त्याच्या बरोबर विविध रंगांची उधळण होतांना दिसते. अचानक एक लालसर रंगाचा फुगवटा जमीनीतून वर येतांना दिसतो आणि पाहतापाहता त्याचे पूर्ण बिंब वर येतांना दिसते. वर येतायेतांनाच त्याचा रंग पालटत असतो आणि तेज वाढत जाते. तो क्षितिजाच्या थोडा वर आल्यानंतर त्याच्याकडे पाहणे अशक्य होते. तरीसुध्दा त्यानंतर तो आकाशात वर वर चढत जाऊन माध्यान्हाच्या सुमारास माथ्यावर येतो आणि त्यानंतर दुसर्‍या बाजूने खाली उतरत जातो हे आपल्याला जाणवते. अखेर संध्याकाळ झाल्यावर सकाळच्या उलट क्रमाने तो अस्ताला जातो. हे रोजचेच असल्यामुळे आपल्याला त्यात कांही विशेष वाटत नाही आणि आपण ते पहाण्याचा मुद्दाम प्रयत्न करत नाही, पण एकादे दिवशी दृष्टीला पडले तर मात्र मंत्रमुग्ध होऊन ते अनुपम दृष्य पहात राहतो.
रोज होत असलेल्या सूर्योदय आणि सूर्यास्तात कांही फरक असतो कां ते पाहण्यापूर्वी माझ्या संवयीप्रमाणे एक उदाहरण देतो. समजा माझ्या घरासमोरील रस्त्याचा आकार चंद्रभागा नदीच्या पात्रासारखा वक्राकार आहे आणि गेटपाशी उभे राहिल्यावर समोरच्या अंगाला डाव्या आणि उजव्या बाजूच्या प्रत्येकी पाच इमारती दिसतात. रोज सकाळी एक पिवळ्या रंगाची स्कूलबस डाव्या बाजूने येते तेंव्हा तिकडच्या पाचव्या इमारतीसमोर आल्यानंतर माझ्या गेटवरून ती दिसू लागते आणि उजव्या बाजूच्या पाचव्या इमारतीच्या पुढे गेल्यानंतर ती नजरे आड जाते. त्या वेळी जर मी चालत चालत डाव्या बाजूच्या पाचव्या इमारतीपाशी आलो असलो तर मला ती दहाव्या इमारतीपाशी येताच दिसू लागेल आणि माझ्या घरापलीकडे जाताच दिसेनाशी होईल, मी जर उजव्या बाजूला तितकेच अंतर चालत जाऊन मागे वळून पाहिले तर माझ्या घरापाशी आल्यानंतर ती बस मला दिसू लागेल आणि दहाव्या इमारतीला पार करेपर्यंत ती दिसत राहील. म्हणजेच रोज त्याच मार्गाने जाणारी ती बस मी जर पाहण्याची जागा बदलली तर मला वेगवेगळ्या ठिकाणी आल्यानंतर दिसेल किंवा दिसेनाशी होईल. याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या जागी जाऊन सूर्योदय पाहिला तर क्षितिजाच्या वेगवेगळ्या भागात तो जमीनीतून वर येतांना दिसेल. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी अस्ताला जातांना तो क्षितिजाला वेगवेगळ्या जागी स्पर्श करतांना दिसेल.
रस्त्यावरून येत असलेली बस आपल्याला जिथे प्रथम दिसते तिथे ती उत्पन्न होत नाही किंवा दिसेनाशी होतांना ती छूमंतर होत नाही. आपल्या नजरेला पडण्यापूर्वी कांही वेळ तसेच ती दिसेनाशी झाल्यानंतरसुध्दा कांही क्षणापुरते ती बस त्या रस्त्यावर कुठेतरी आहे असेच आपण समजतो. याचप्रमाणे सूर्य, चंद्र आणि चांदण्या जेंव्हा आपल्याला दिसत नाहीत तेंव्हासुध्दा त्या आभाळाच्या कुठल्या तरी भागात अस्तित्वात असतातच. दिवसा सूर्याच्या प्रखर तेजामुळे आकाशातल्या चांदण्या आपल्याला दिसत नाहीत आणि रात्री जेवढ्या चांदण्या आपल्याला एका वेळी दिसत असलेल्या आकाशाच्या भागात असतात तेवढ्याच त्या वेळी दिसतात. आपण ठरवून रोज एकाच जागेवरून सूर्योदय पहायचे ठरवले तर काल तो जिथे आणि जेंव्हा उगवला होता तिथेच आणि त्याच वेळी तो आज उगवला आहे असे आपल्याला वाटेल. सूर्याचे बिंब आकाशातली थोडीशी जागा व्यापते आणि त्याला जमीनीतून पूर्णपणे वर यायला थोडा अवधी लागतो. काल आणि आज यामधला फरक यांच्या तुलनेत कमी असला तर तो आपल्या लक्षात येत नाही. आपण फक्त दर रविवारी सूर्योदय पाहून त्याची नोंद ठेवायची असे ठरवले तर मात्र मागल्या रविवारच्या मानाने या रविवारी उगवण्याच्या वेळी क्षितिजावरच तो थोडा उजव्या किंवा डाव्या बाजूला सरकला असल्याचे लक्षात येईल. एकदा तो उजव्या बाजूला सरकू लागला की सहा महिने तिकडे सरकत जातो आणि त्याबरोबर उशीराने उगवत जातो. त्यानंतर त्याची उगवण्याची जागा पुढील सहा महिने डाव्या बाजूला सरकत जाते आणि तो लवकर उगवू लागतो असे चक्र चालत राहते. सूर्याच्या मावळण्याची जागासुध्दा अशीच डाव्या किंवा उजव्या बाजूला सरकत जाते, मात्र तो जेंव्हा लवकर उगवतो तेंव्हा उशीरा मावळतो त्यामुळे दिवस मोठा वाटतो आणि उशीराने उगवल्यावर लवकर अस्ताला गेल्यामुळे दिवसाचा काळ लहान होतो.
माध्यान्ही सूर्य आपल्या माथ्यावर येतो. मुंबईला दुपारी सुमारे साडेबारा वाजता तो आकाशातली सर्वात जास्त उंची गांठतो आणि त्यानंतर खाली येऊ लागतो. पण तो आपल्या डोक्याच्या अगदी बरोबर वर क्वचितच येतो. उगवतीकडे तोंड करून वर आकाशाच्या दिशेने पाहिले तर वर्षाच्या बर्‍याचशा काळात तो आपल्याला थोडा उजवीकडे दिसतो आणि थोडे दिवस तो डाव्या बाजूला कललेला वाटतो. भोपाळच्या पलीकडे ग्वाल्हेर किंवा दिल्लीला राहणार्‍या लोकांना वर्षभर रोज तो उजव्या बाजूलाच दिसतो, सकाळी उगवतांना उजवीकडे किंवा डावीकडे कुठल्याही बाजूला सरकला असला तरीसुध्दा माथ्यावर येतायेता तो फक्त उजवीकडेच झुकलेला असतो. सूर्याचे उगवण्याचे ठिकाण, माथ्यावरचा बिंदू आणि मावळण्याची जागा यांना जोडणारी काल्पनिक कमान काढली तर तो त्या दिवशी सूर्याच्या आकाशातल्या भ्रमणाचा मार्ग झाला. बादलीची कडी उचलून थोडी तिरपी धरली तर जशी दिसेल तसा त्याचा आकार असतो. रोजच्या रोज तो किंचित बदलत असतो.
आकाशातल्या सूर्याकडे लक्षपूर्वक पाहणे कठीण असते, तसेच आकाशात कसलीही खूण नसल्यामुळे त्याचा मार्ग नीटसा समजत नाही. पण सूर्याच्या भ्रमणाचे अप्रत्यक्ष रीतीने निरीक्षण करण्यासाठी एक सोपी युक्ती आहे. आपल्या अंगणात किंवा गच्चीवर जिथे दिवसभर ऊन पडते अशा जागी एक हातभर उंचीची काठी उभी करून ठेवली तर तिची सावली जमीनीवर कुठे पडते ते पाहून त्याची नोंद करणे शक्य असते. सकाळी आणि संध्याकाळी आपली सावली लांबवर पडते आणि दुपारी ती लहान होते हे सर्वांना ठाऊक असते, पण तिची दिशा बदलत असल्याचे कदाचित लक्षात येत नसेल. मी दिलेला प्रयोग करून पाहिल्यास काठीची सांवली लहान मोठी होता होतांना घड्याळाच्या कांट्या प्रमाणे त्या काठीभोंवती फिरते हे दिसून येईल. त्या आडव्या सांवलीचे टोक आणि उभ्या काठीचे टोक यांना जोडून एक काल्पनिक रेषा काढली तर सूर्याच्या मार्गाचा अंदाज त्यावरून करता येतो.
चंद्राचे तेज एवढे प्रखर नसल्यामुळे त्याचा आकाशातला मार्ग पाहणे सोपे असेल असे वाटेल. पण दिवसा चंद्र दिसतच नाही आणि रात्री जागून त्याला पहात राहणे कठीण असते. त्याशिवाय सूर्य जसा रोज सकाळी उगवतो आणि सायंकाळी मावळतो तसे चंद्राचे नाही. त्यामुळे त्याचे निरीक्षण करण्यासाठी महिनाभर सुटी घेऊन एकाद्या सोयिस्कर ठिकाणी जाऊन रहायला पाहिजे. पण आपल्याला जेवढे जमते तेवढे पाहिले तरी बरीचशी माहिती मिळू शकते. पौर्णिमेच्या दिवशी एका बाजूला सूर्य मावळत असतो त्याच सुमाराला दुसर्‍या बाजूने पूर्ण गोलाकार चंद्र उगवतो आणि रात्रभर आपल्यावर चांदणे शिंपून दुसरे दिवशीच्या सूर्योदयाच्या सुमाराला त्याच्या विरुध्द बाजूला मावळतो. फक्त याच दिवशी आपण त्याचा उदय व अस्त हे दोन्ही पाहू शकतो. त्याच्या दुसर्‍या दिवशी सूर्य अस्ताला गेला तरी चंद्राचा पत्ताच नसतो. तो सावकाशीने उगवतो आणि रात्रभर आकाशात राहून दुसरे दिवशी उन्हे वर आल्यानंतर मावळतो, पण तोपर्यंत तो अत्यंत फिकट झाला असल्यामुळे आपल्याला नीट दिसत नाही. त्यानंर रोज तो सुमारे पाऊण तास उशीरा उगवत जातो आणि आकाराने लहान लहान होतांना दिसतो. आठवडाभराने पाहिल्यास मध्यरात्रीच्या सुमारास अर्धगोलाच्या आकाराचा चंद्र उगवतो आणि उत्तररात्री प्रकाश देतो. रोज असाच उशीर करता करता आणखी चार पाच दिवस गेल्यानंतर तो सूर्याच्या पुढे असल्यासारखा वाटतो. पहाटे सूर्य उगवण्याच्या आधी उगवलेली चंद्राची कोर सूर्योदयाच्या आधी पूर्वेच्या आकाशात दिसते आणि सूर्याच्या प्रकाशात लुप्त होते. त्यानंतर सूर्य आणि चंद्र साधारणपणे एकाच वेळी उगवतात आणि मावळतात. दिवसा सूर्याच्या उजेडात चंद्र दिसत नाही आणि रात्री तो आभाळात नसतोच. त्यामुळे अवसेची काळोखी भयाण रात्र होते. त्यानंतर चंद्राच्या पुढे गेलेला सूर्य आधी मावळतो आणि त्याच्या अस्तानंतर चंद्राची रेघेसारखी कोर थोडा वेळ दिसून सूर्याच्या पाठोपाठ अस्तंगत होते. चंद्राचे उशीराने आकाशात येणे आणि जाणे चालूच असते. दिवसा तो उगवतो आणि सूर्यास्तानंतर कांही काळ आकाशात राहून मावळतो. या काळात तो आकाराने मोठा होत होत पौर्णिनेला त्याचे पूर्ण बिंब सूर्यास्ताच्या सुमाराला उगवते. हे चक्र चालत राहते. त्यामुळे पौर्णिमा सोडली तर इतर रात्री तो कधी उगवतांना तर कधी मावळतांना दिसू शकतो. तो जेवढा काळ आकाशात दिसतो त्याचे निरीक्षण करून तेवढ्या काळातला त्याचा मार्ग पाहता येतो आणि ती वक्ररेषा वाढवून त्या मार्गाच्या उरलेल्या भागाची कल्पना करता येते.
सूर्याचा आकाशातला मार्ग सूक्ष्म रीतीने रोज बदलतो तर चंद्राचा मार्ग जाणवण्याइतपत वेगाने बदलत असतो. हा मार्ग सुध्दा बादलीच्या तिरप्या कडीच्या आकाराचा असला तरी तो सूर्याच्या मार्गापासून भिन्न असतो. हे दोन्ही मार्ग एकमेकांना छेद देतात, पण सूर्य आणि चंद्र वेगवेगळ्या वेळी आकाशात येत असल्यामुळे त्यांची टक्कर होत नाही. पण कधीकधी ते दोघेही आपापल्या मार्गावरून जातांजातां एकमेकांच्या अगदी जवळ जवळ येतात. काल परवा जर कोणी पहाटे उठून आधी उगवलेला चंद्र आणि नंतर झालेला सूर्योदय पाहिला असेल तर ते दोघेही जवळ जवळ एकाच ठिकाणी क्षितिजावरून वर येतांना दिसले असतील. उद्या २२ जुलैला सकाळी उगवतांना ते दोघेही एकसाथ आणि एकाच जागेवरून उगवतील. त्यातला चंद्र आपल्याला दिसणारच नाही. लहानशा ढगाच्या आड चंद्र लपतो आणि तो ढग बाजूला झाला की चंद्र पुन्हा दिसू लागतो, त्याप्रमाणे चंद्राच्या आड गेल्यामुळे पलीकडे असलेला सूर्याचा कांही भाग झाकला जाईल. सुरुवातीला चंद्र पुढे असल्यामुळे मागून आलेल्या सूर्याचा वरचा भाग त्याच्या आड जाऊन आपल्याला दिसणार नाही. दोघेही क्षितिजापासून वर सरकत असतांना सूर्याचा वेग किंचित जास्त असल्यामुळे हळूहळू त्याचा मधला भाग दिसेनासा होईल. त्यानंतर खालचा भाग झाकला जाईल तेंव्हा वरचा भाग दिसायला लागेल आणि कांही काळानंतर चंद्राच्या बिंबाला पूर्णपणे पार केल्यानंतर सूर्याचे पूर्णबिंब दिसू शकेल. कांही ठिकाणी कांही मिनिटांकरता सूर्य पूर्णपणे झाकला जाणार आहे. वरुणराजाने मेहरबानी करून आकाशातले ढग बाजूला केले तर आपण सगळे हे दृष्य पाहू शकतो.
हे करतांना आपल्या डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असते. पूर्वीच्या काळात गडद काळ्या रंगाची जाड भिंगे मिळत नसत. त्यामुळे सूर्याकडे टक लावून पहातांना डोळ्यांना इजा होण्याची शक्यता पाहता सरसकट ग्रहण पाहूच नये असे सांगितले जात असावे. आता आपण डोळ्यांची काळजी घेऊ शकतो आणि आपल्याकडल्या आभाळात ढग आले तरी दुसर्‍या ठिकाणी दिसणारे ग्रहण टेलीव्हिजनवर पाहू शकतो. उद्या दिसणारे सूर्यग्रहण या शतकातले सर्वात मोठे असल्यामुळे पाहून घ्यावे. कांही लोक तर ते पाहण्यासाठी हवेत उड्डाण करणार आहेत आणि त्यासाठी लाख लाख रुपये मोजायला तयार आहेत. आपल्याला एवढी हौस नसली तरी घरबसल्या फुकट दिसणारे हे निसर्गाचे रुपडे पहायला काय हरकत आहे ?

Saturday, July 18, 2009

न्यू जर्सी ते न्यूयॉर्क

प्रत्येक देशाची कांही प्रतीके असतात. भारताचा ताजमहाल, इंग्लंडमधले लंडनचे बिगबेन घड्याळ, फ्रान्सचा आयफेल टॉवर वगैरे. यांपेक्षाही भव्य, सुंदर आणि आकर्षक वास्तू नंतर बांधल्या गेल्या असल्या तरी या ऐतिहासिक काळातील प्रतीकांची जागा त्या घेत नाहीत. याचप्रमाणे न्यूयॉर्कमधला स्वातंत्र्यदेवीचा पुतळा हे तेथील सर्वाधिक प्रसिध्द प्रेक्षणीय स्थळ आहे. ते पाहिल्याखेरीज अमेरिकेची वारी केल्यासारखे वाटत नाही. म्हणूनच आगामी हिंवाळ्याचा विचार करता अमेरिकेला पोचताच आधी स्वातंत्र्यदेवतेचे दर्शन घेण्याचा बेत आम्ही केला. शनिवारी न्यूजर्सीला पोचून तिथे मुक्काम करायचा आणि रविवारी जिवाचे जमेल तेवढे न्यूयॉर्क करून सोमवारी तिकडचा इतर भाग पाहण्यासाठी प्रस्थान करायचे असा सर्वांच्या सोयीचा बेत ठरला. त्यानुसार आम्ही शनिवारी न्यूजर्सीमधल्या पार्सीपेन्नी या गांवाला पोचून थोडा आराम केला. त्या वेळेला हवेत चांगलाच गारवा असला तरी वातावरण प्रसन्न होते. अंगावर भरपूर गरम कपडे चढवून संध्याकाळी गावात एक फेरफटका मारला. आभाळात थोडे ढग दिसत असले तरी त्यांनी त्या वेळी दोन शिंतोडेसुध्दा उडवले नाहीत.

न्यूयॉर्कमध्ये फिरण्यात जास्तीत जास्त वेळ घालवावा म्हणून घड्याळात गजर लावून भल्या पहाटे उठून बसलो. घट्ट बंद केलेला दरवाजा, जाड कापडाच्या पडद्यांआड झांकलेल्या खिडक्या आणि कृत्रिम उबदार हवेचा पुरवठा यामुळे घराच्या बाहेर काय चालले आहे याचा पत्ता लागत नव्हता. तरी सुध्दा बाहेर चाललेले निसर्गाचे संगीत ऐकू येत होते. दरवाजा थोडासा किलकिला करून पाहिले तर बाहेर जोराचा पाऊस पडत होता, झाडांची पाने वा-याने नुसती सळसळत नव्हती, ती फडफडत होती आणि थंडगार हवेचा जो धारदार झोत दाराच्या फटीतून आत आला तो सगळ्या गरम कपड्यांना पार करून थेट हाडांपर्यंत जाऊन पोचला आणि त्यांना त्याने गोठवून टाकले. या असल्या भयानक हवेत आम्ही कसले उघड्यावर फिरणार होतो? पटकन दरवाजा लावून घेतला आणि उबदार पांघरुणात घुसलो.

आमची झोप तर चाळवलेली होती. वेळ घालवण्यासाठी टेलिव्हिजन लावला. तिकडचे कोणतेच चॅनल ओळखीचे नव्हते, त्यामुळे रिमोटशी चाळा करत राहिलो. त्यातले एक चॅनेल फक्त 'वेदर' ला वाहिलेले होते. त्यात अमेरिकेतील शहरे, संस्थाने, निरनिराळे देश आणि पृथ्वीच्या पाठीवरील सगळ्या ठिकाणचे हवापाणी क्रमाक्रमाने दाखवत होते. ते पाहतांना जगाच्या नकाशाची उजळणी होत होती. न्यूयॉर्कला त्या वेळी पाऊस पडत असला तरी दिवसभर तेथील हवामान फक्त ढगाळ राहील आणि पावसाच्या एक दोन सरी कदाचित पडतील असे भविष्य ऐकून धीर आला. आजकाल वातावरणाचा अंदाज हा तिकडे विनोदाचा विषय राहिलेला नाही आणि उपग्रहांवरून घेतलेली ताजी छायाचित्रे दाखवत असल्यामुळे त्यांच्या अंदाजावर विश्वास बसतो. तरीही आमच्या उत्साहावर बाहेरच्या पावसाचे थंडगार पाणी पडत असल्यामुळे शरीराच्या हालचाली संथगतीनेच होत होत्या. हळूहळू सकाळची आन्हिके आटोपली, बाहेर हॉटेलात ब्रेकफास्ट घ्यायचा आधीचा बेत बदलून घरीच नाश्ता केला. त्यातला एक एक पदार्थ तोंडभर तारीफ करत चवीने खाल्ला. तोंपर्यंत पाऊस पूर्णपणे थांबला होता आणि ऊन पडले नसले तरी बाहेर चांगला उजेड झाला होता. त्यामुळे अंगात उत्साह आला. सगळे लोकरीचे कपडे अंगावर चढवले, दिवसभरात लागू शकणा-या अत्यावश्यक गोष्टी झोळ्यात भरून घेतल्या आमि न्यूयॉर्कदर्शनाला निघालो.

न्यूजर्सी स्टेटच्या त्या भागातून न्यूयॉर्ककडे जाणारा एकच रूट आहे. अतिजलद गतीने जाणा-या वाहनांसाठी मोठमोठे महामार्ग आहेत, त्यावरून बसेस जात नाहीत. दाट वस्तीतून जाणा-या एका मध्यम आकाराच्या रस्त्याने गांवोगांवच्या प्रवाशांना गोळा करत ही न्यूयॉर्कची बस जाते. पार्सिपेन्नीच्यातारूंसाठी असलेला थांबा आमच्या निवासस्थानापासून सुमारे दोन किलोमीटर दूर होता. अमेरिकेतले लोक एवढे लांब अंतर पायी चालण्याचा विचारसुध्दा मनात आणत नाहीत. बहुतेक जागी रस्त्याच्या कडेला फुटपाथही नसतात. त्यामुळे बाजूला सुसाट वेगाने वाहने जात असतांना त्या रस्त्यांच्या कडेने चालण्याची आमची हिंमत झाली नसती. वाशीत असतो तसा ऑटोरिक्शांचा सुळसुळाट तिकडे नसतो. हे वाहन एकाद्या प्रदर्शनात पहायला ठेवले असले तरच तिथे कदाचित दिसेल. न्यूयॉर्कच्या रस्त्यावर भरपूर टॅक्सी दिसत असल्या तरी पारसीपेन्नीहून तिकडे टॅक्सीने जाणे परवडण्याच्या पलीकडे होते. एक तर त्यासाठी आधी फोन करून टॅक्सीवाल्याची अॅपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि त्याचे भाडे विमानाहून जास्त असते. त्यामुळे सौरभने आपली कार काढली आणि आमचा प्रवास सुरू झाला.

या भागातल्या रस्त्यांवरील बहुतेक बसस्टॉप्सच्या मागे एक पार्किंग लॉट असतो. शहरात कामासाठी जाणारे बरेच लोक या 'पार्क अँड राइड' सेवेचा लाभ घेतात. रविवारचा दिवस असल्यामुळे त्यांची गर्दी नव्हती, त्या दिवशी बाहेर पडलेले बहुतेक प्रवासी हे आमच्यासारखे पर्यटकच असावेत. आम्ही गेलो त्या बसस्टॉपपाशी एक फुटबॉलचे मैदान आहे. आम्ही तिथे पोचण्याच्या आधीच कांही उत्साही मंडळींनी तिथल्या चिखलात चेंडूबरोबर लाथाळी सुरू केली होती. तो सामना नसल्यामुळे खेळाडूंचे गणवेश आणि शिटी फुंकत पळणारे रेफरी नव्हते, तसेच प्रेक्षकही नव्हते. त्यामुळे पार्किंग लॉटमध्ये भरपूर रिकामी जागा होती. पावसाची सर आलीच तर झाडांच्या आडोशाने बसस्टॉपपर्यंत धावत जाता यावे या दृष्टीने सोयिस्कर अशी जागा पाहून सौरभने आपली गाडी उभी केली आमि आम्ही बसस्टॉपवर आलो.

तिथे आमच्याखेरीज आणखी चारपांचच लोक असतील. बस शेजारच्याच गांवातून निघाली असल्यामुळे जवळ जवळ रिकामी होती. हे अपेक्षित असले तरी पाहून हायसे वाटले. तिकडे बसमध्ये कंडक्टर नसतोच. बसमध्ये चढण्या व उतरण्यासाठी पुढच्या बाजूने एकच दरवाजा असतो. बस थांबल्यानंतर ड्रायव्हर तो उघडतो, आत आलेल्या प्रवाशांना तोच तिकीटे देतो आणि बसल्या जागेवरून एक बटन दाबून दरवाजा करून बस सुरू करतो. तिकीट देण्यासाठी एक यंत्र होते. बहुतेक प्रवासी त्यात आपले क्रेडिट किंवा डेबिट कार्ड स्वॅप करून स्वतःच आपले तिकीट काढतात. त्यामुळे ड्रायव्हरकडे फारसा गल्ला नसतो आणि मोठी नोट दिल्यास पैसे परत न मिळण्याची शक्यता असल्यामुळे तिकीटाची नेमकी रोख रक्कम देणे शहाणपणाचे असते. हे सगळे पहात आम्हा आत चढलो आमि अक्षरशः लहान पोराप्रमाणे धांवत जाऊन खिडकीजवळच्या जागा पकडल्या. पुढील दोन तीन स्टॉप्सनंतर मात्र बसमधली सर्व आसने भरली गेली आणि त्यापुढे आलेल्या प्रवाशांना उभे रहावे लागले.

आमची बस एस्टी किंवा बेस्टच्या बशींपेक्षा थोडी चांगली होती, पण व्होल्होइतकी आरामशीर नव्हती. तासभराच्या प्रवासासाठी ठीक होती एवढेच. रस्त्यांवर दुतर्फा दुकाने, घरे, बगीचे, चर्चेस वगैरे दिसत होते. अशा प्रकारच्या इमारती याआधी पाहिलेल्या असल्या तरी पुन्हा पाहतांना मजा वाटत होती. मध्येच एकादा उड्डाणपूल किंवा भुयार लागत असे. भुयारातून बाहेर पडल्यानंतर वेगळेच दृष्य दिसत असे. दूरवर गगनचुंबी इमारतींचे जंगल दिसायला लागल्यानंतर आपण न्यूयॉर्कला पोचलो असल्याचे लक्षात आले. थोड्याच वेळात आमची बस एका प्रचंड इमारतीच्या पोटात घुसून उभी राहिली. ती जमीनीच्या खालून तिथे गेली की उंचावरून थेट दुस-या तिस-या मजल्यावर गेली तेसुध्दा त्या घाईत समजले नाही. सगळ्या प्रवाशांच्या पाठोपाठ आम्ही सुध्दा उतरलो. ते अख्खे बसस्टेशन एका महाकाय इमारतीच्या पोटात असल्यामुळे आम्ही नेमके कुठे आहोत ते कांही समजत नव्हते.

Wednesday, July 15, 2009

जन्मतारीख - भाग ५

अत्यंत दुर्मिळ असे वाटणारे कांही योगायोग आपल्याला आपल्या आजूबाजूला घडत असतांना नेहमी दिसतात व त्याचे नवल वाटते. पण संख्याशास्त्राच्या नियमांप्रमाणे मुळात ते तितकेसे दुर्मिळ नसतातच असे मी मागे एका शास्त्रीय स्वरूपाच्या लेखात त्यातल्या गणितासह दाखवले होते. या बाबतीत जन्मतारखांचे उदाहरण नेहमी दिले जाते. रोज जन्म घेणा-या मुलांची संख्या सर्वसाधारणपणे वर्षभर समानच असते असे गृहीत धरले तर आपला जन्मदिवस वर्षामधील ३६५ दिवसापैकी कधीही येऊ शकतो. म्हणजे एका विशिष्ट तारखेला तो येण्याची शक्यता ३६५ मध्ये १ इतकी कमी असते. चाळीस किंवा पन्नास माणसांचा समूह घेतला तरी त्यातील कुठल्या तरी एका माणसाची जन्मतारीख त्या विशिष्ट तारखेला येण्याची शक्यता ३६५ मध्ये ४०-५० किंवा सात आठमध्ये एक इतकीच येईल. पण अशा समूहातील कुठल्याही दोन माणसांची जन्मतारीख कुठल्या तरी एका दिवशी येण्याची शक्यता मात्र माणसांच्या संख्येबरोबर झपाट्याने वाढत जाते. तेवीस जणांमध्ये ती पन्नास टक्क्यावर जाते, चाळीस माणसात सुमारे ९० टक्के आणि पन्नास माणसात तर ९७ टक्के इतकी होते. त्यामुळेच एका वर्गातील विद्यार्थी, एका इमारतीमधील रहिवासी, लोकप्रिय नटनट्या वगैरे कोणताही पन्नासजणांचा समूह घेतल्यास त्यात एका तारखेला जन्मलेल्या दोन व्यक्ती हटकून सापडतात.


पन्नास लोकांच्या समूहात एका दिवशी जन्माला आलेल्या दोन व्यक्ती जरी निघत असल्या तरी त्या दोनमध्ये आपला समावेश होण्याची संभाव्यता नगण्यच असते. त्यामुळे आपल्या जन्मतारखेलाच जन्माला आलेल्या व्यक्ती ब-याच लोकांना कधी भेटतही नसतील. या बाबतीत मात्र मी फारच सुदैवी आहे असे म्हणावे लागेल. आधुनिक इतिहासात जगद्वंद्य ठरलेल्या विभूती हाताच्या बोटावरच मोजता येतील. त्यांच्यातल्या एका महापुरुषाच्या वाढदिवसालाच जन्म घेण्याचे भाग्य शेकडा एक दोन टक्के एवढ्यांनाच लाभत असेल. गांधीजयंतीच्या दिवशी जन्म घेऊन मला ते लाभले. पंडित नेहरूंच्यापासून मनमोहनसिंगांपर्यंत भारताचे पंधरा सोळा पंतप्रधान झाले असतील. त्यातल्या एकाचा, पं.लालबहादूर शास्त्री यांचा, जन्मदिवससुद्धा त्याच दिवशी येतो हा आणखी एक योगायोग. हे भाग्यसुद्धा चार पांच टक्क्यावर अधिक लोकांना मिळणार नाही.


माझे सख्खे, चुलत, आते, मामे, मावस वगैरे सगळे मिळून वीस पंचवीस बहीणभाऊ आहेत, ते देशभर वेगवेगळ्या भागात विखुरलेले आहेत. त्यातल्या फारच थोड्याजणांची जन्मतारीख मला माहीत आहे कारण आम्ही जेंव्हा कारणाकारणाने भेटतो तेंव्हा आमच्या बोलण्यात वाढदिवस हा विषयच सहसा कधी निघत नाही. तरीसुद्धा एकदा कधीतरी हा विषय निघाला आणि चक्क माझ्या एका जवळच्या आप्ताची जन्मतारीखसुद्धा २ ऑक्टोबर आहे हे समजले. आम्ही रहात असलेल्या बिल्डिंगमध्ये माझ्या मुलांच्या वयाची जी पंधरा वीस इतर मुले होती त्यातल्या गौरवचा वाढदिससुद्धा गांधीजयंतीलाच येत असे.

या सगळ्या लोकांची जन्मतारीख एक असली तरी ते वेगवेगळ्या वर्षी जन्मलेले होते. जुळी भावंडे सोडली तर एकाच दिवशी जन्माला आलेली दोन माणसे शाळेतच भेटली तर भेटली. त्यानंतर ती भेटण्याची शक्यता फारच कमी असते. असे असले तरी मी ज्या दिवशी जन्माला आलो नेमक्या त्याच दिवशी जन्म घेतलेल्या दुस-या व्यक्तीशी माझी ओळखच झाली एवढेच नव्हे तर घनिष्ठ संबंध जुळले. खरे तर आधी संबंध जुळले आणि त्यातून पुरेशी जवळीक निर्माण झाल्यानंतर हा योगायोग समजला. त्याचे नांवदेखील मोहन हेच होते. कदाचित त्याचा जन्म गांधीजयंतीला झाला हे त्याच्या मातापित्यांच्या लक्षात आले असेल म्हणून त्यांनी त्याचे नांव मोहनदास यावरून मोहन ठेवले असणार असे कोणालाही वाटेल. पण त्या कुटुंबातील लोकांची एकंदर विचारसरणी पाहता महात्मा गांधींच्या हयातीत, त्यातही भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीच्या काळात महात्माजींच्याबद्दल इतका आदरभाव त्यांच्या मनात वाटत असेल याची शक्यता मला कमीच दिसते.


अर्थातच आम्हा दोघांची जन्मतिथीसुद्धा एकच होती. मागे भारतीय आणि पाश्चात्य कालगणनापद्धतींचा तौलनिक अभ्यास करतांना माझ्या लक्षात एक गोष्ट आली होती. ती म्हणजे या दोन्ही पद्धतींमध्ये एकोणीस वर्षांचा कालावधी जवळजवळ तंतोतंत समान असतो. म्हणजे आजच्या तारखेला पंचांगात जी तिथी आहे तीच तिथी एकोणीस वर्षांपूर्वी याच तारखेला होती आणि एकोणीस वर्षांनंतर येणार आहे. हे गणिताने सिद्ध होत असले तरी ते पडताळून पाहण्यासाठी माझ्याकडे जुनी पंचांगे नव्हती. त्यामुळे मनाची खात्री होत नव्हती. त्यानंतर मी जेंव्हा महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग वाचायला सुरुवात केली तेंव्हा त्यातल्या पहिल्याच प्रकरणात या माझ्या द़ष्टीने आगळ्या वेगळ्या 'सत्याची' प्रचीती आली. एकोणीस वर्षानंतर हा योग येतो म्हंटले तर दोन माणसांची जन्मतारीख व जन्मतिथी या दोन्ही गोष्टी जुळण्याची संभवनीयता सात हजारांत एक इतकी कमी आहे. तरीही मला अशा एका महान व्यक्तीची माहिती मिळाली आणि दुसरी अशी प्रत्यक्षात भेटली हा तर पांच कोटींमध्ये एक इतका दुर्मिळ योगायोग मानावा लागेल.
खरोखरच हा निव्वळ योगायोग होता की मला ठाऊक नसलेले एकादे कारण त्याच्या मागे आहे असा प्रश्न मला नेहमी पडतो.

Tuesday, July 14, 2009

जन्मतारीख - भाग ४


माझ्या लहानपणी जन्मतारखेला जसे फारसे महत्व नव्हते तसेच आमच्या जीवनात शुभेच्छांचा प्रवेशसुद्धा अजून झाला नव्हता. आम्ही संक्रांतीला आप्तेष्टांकडे जाऊन त्यांना तिळगूळ देत असू आणि दस-याला सोने. दिवाळीला तर एकमेकांच्या घरी जाऊन फराळ झोडणे हेच मुख्य काम असे. या सगळयांबरोबर आणि इतर वेळांसुद्धा वडीलधा-यांना वाकून नमस्कार करायचा आणि त्यांनी प्रेमाने थोपटून आशीर्वाद द्यायचे यातच सर्व शुभेच्छा, सदीच्छा वगैरे येत असत. लहान मुलाने मोठ्या माणसाकडे जाऊन त्याला "देव तुमचे भले करो" वगैरे म्हणणे हा फारच चोंबडेपणा झाला असता. आता काळ बदलला आहे. माझ्या नातवंडांच्या वयाची मुले मला नेहमी "हॅपी अमुक तमुक डे" असे 'विश' करतात आणि मी अत्यंत आनंदाने व कौतुकाने त्या सदीच्छांचा स्वीकार करतो.

आमच्या लहानशा गांवात दुस-या कोणाला पत्र लिहून पाठवणारा माणूस वेडाच ठरला असता. त्याला अपवाद एकाद्या प्रेमवीराचा असेल; पण तोही एक प्रकारचा वेडाच झाला ना! परगांवाहून आलेली पत्रे टपालखाते इमाने इतबारे घरपोंच आणून देत असे. त्या काळांत दाराला टपालपेटी लावलेली नव्हती आणि मुळांत दरवाजाच दिवसभर उघडा असे. पोस्टमन त्यातून दहा पावले चालत आंत यायचा आणि सोप्यामध्ये बसलेल्या व्यक्तीच्या हांतात अदबीने पत्र द्यायचा.

अमीन नांवाचा एकच वयस्कर पोस्टमन मी अगदी लहान असतांना वर्षानुवर्षे आमच्या घरी पत्रे द्यायला येत असल्यामुळे घरच्यासारखाच झाला होता. तो कितव्या इयत्तेपर्यंत शाळा शिकला होता आणि त्याला कोणकोणत्या भाषा वाचता येत होत्या कुणास ठाऊक. त्याला पत्तादेखील वाचायची गरज वाटत नसे. फक्त नांव वाचल्यावर ती व्यक्ती कुठे राहते ते त्याला समजायचे. "मजमूँ भाप लेते हैं लिफाफा देखकर" असे हुषार माणसाबद्दल म्हणतात. या अमीनला सुद्धा पत्र हांतात देतादेताच त्यातल्या मजकुराची कल्पना येत असावी. एखादे लग्न ठरल्यासारखी गोड बातमी आणल्याबद्दल त्याचे तोंड गोड केले जायचेच. क्वचित प्रसंगी वडिलपणाच्या अधिकाराने तो दोन शब्द बोलून धीरसुद्धा देत असे. पण त्याने आणलेल्या पत्रात कधीसुद्धा एकादे ग्रीटिंग कार्ड पाहिल्याचे मात्र मला आठवत नाही.

आमचा पोस्टमन कितीही कर्तव्यदक्ष असला तरी त्या काळांतली दळणवळणाची साधने फारच तुटपुंजी होती. त्यातही वादळवारे, पाऊसपाणी यांमुळे व्यत्यय येत असे. त्यामुळे एका गांवाहून दुस-या गांवी पत्र कधी जाऊन पोंचेल याचा नेम नव्हता. तांतडीचा संदेश पाठवण्यासाठी तारेची सोय होती. त्यासाठी येणारा खर्च त्यातील शब्दांच्या संख्येप्रमाणे वाढत असल्यामुळे तार पाठवण्यासाठी एक संक्षिप्त भाषा प्रचारात आली होती.त्यात अव्यये व विशेषणे तर नसतच, कधीकधी क्रियापददेखील गाळले जात असे. बहुतेक तारांमध्ये "अमका गंभीर" नाही तर "तमका दिवंगत" आणि "ताबडतोब निघा" अशाच प्रकारचे संदेश असल्यामुळे तार वाटणा-या पोस्टमनची सायकल कोणाच्या दाराशी उभी राहिलेली दिसली की गल्लीत कुजबुज किंवा रडारड सुरू होत असे. तो कोणाच्या घरी पाणी प्यायला गेला असला तरी तो बाहेर पडलेला दिसतांच सांत्वन करण्याच्या उद्देशाने तिथे गेलेले लोक "या यमदूतापासून चार हांत दूर रहा" असा सल्ला त्या घरातल्या लोकांना देत असत. क्वचित कधीतरी परगांवी कोणाच्या घरी झालेल्या अपत्यजन्माची शुभवार्ता येई आणि तिथली मंडळी उत्साहाने बाळंतविडा तयार कराच्या कामाला लागत. उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी पहिल्यांदाच घराबाहेर पडणा-या मुलांना त्यांच्या माता पोटाशी कवटाळून निरोप देतांनाच "पोचल्याची तार कर" असे सांगत, त्यामुळे "सुखरूप पोंचलो" अशा मजकुराच्या तारा येऊ लागल्या आणि तारेबद्दल मनात वाटणारी धास्ती कमी झाली.

हे ठराविक मजकुरांचे संदेश कडकट्ट करीत पाठवणा-या लोकांना त्याचा कंटाळा आला असावा किंवा त्यांना पुरेसे काम नाही असे त्यांच्या अधिका-यांना वाटले असावे, यातल्या कोठल्याशा कारणाने तारेमधून शुभेच्छासंदेश पाठवण्याची योजना सुरू झाली. परीक्षेतील यश, नोकरी वा बढती मिळणे, विवाह, अपत्यप्राप्ती अशा घटना आणि दिवाळी, ईद, ख्रिसमस वगैरेनिमित्त पाठवायचे पंधरा वीस संदेश लिहून त्याला क्रमांक दिले गेले आणि आपण फक्त तो क्रमांक लिहिला की तो वाक्य लिहिलेली तार पलीकडच्या माणसाला मिळत असे. पोस्टऑफीसात वर्षानुवर्षे धूळ खात पडून मळकट झालेल्या पांढ-या कागदाऐवजी फुलापानांची चित्रे असलेल्या आकर्षक रंगीबेरंगी कागदावर हा बधाईसंदेश दिला जात असे. या नाविन्यामुळे म्हणा किंवा एका शब्दाच्या खर्चात अख्खे वाक्य पाठवण्याचे समाधान मिळत असल्यामुळे म्हणा, हे संदेश बरेच लोकप्रिय झाले. त्यांमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करणारा संदेशसुद्धा असावा, पण मला तो मिळण्याचे भाग्य प्राप्त झाले नाही. ज्या काळात तारांद्वारे संदेश पाठवणे सुरू झाले तेंव्हा कोणालाच माझी जन्मतारीख माहीत नव्हती आणि जेंव्हा तिला महत्व आले तोपर्यंत तार पाठवणेच कालबाह्य झालेले होते.

'दूरध्वनी' हा मराठी प्रतिशब्द जरी 'तार' या शब्दाप्रमाणे बोलीभाषेत रूढ झाला नाही तरी संदेशवहनाचे हे माध्यम तारेपेक्षा सहस्रावधीपटीने अधिक लोकप्रिय झाले. संदेश पाठवून त्याचे उत्तर येण्याची वाट पहात बसण्यापेक्षा परस्पर संवाद साधणे कितीतरी चांगले असते आणि तेही घरबसल्या होत असेल फारच उत्तम! त्यामुळे टेलीफोनचा विकास आणि प्रसार झपाट्याने झाला. माझ्या संपूर्ण आयुष्यात जेवढ्या तारा मला मिळाल्या असतील किंवा मी पाठवल्या असतील त्यापेक्षा अधिक वेळा हल्ली रोजच फोनवर बोलणे होते. त्यात घरी कोणाचा जन्मदिवस असेल तर विचारायलाच लको. कधीकधी एका हांतात एक रिसीव्हर आणि दुस-या हांतात सेलफोन घेऊन एकदम दोघादोघांशीसुद्धा कधीकधी बोलावे लागते. एकदा माझ्या जन्मतारखेला मी पुण्यात होतो. तरीही ज्यांनी माझ्या जेथे जातो तेथे सांगाती येणा-या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला तर कांही लोकांनी प्रयत्नपूर्वक पुण्याचा नंबर मिळवला. उरलेल्या लोकांचे ध्वनिमुद्रित केलेले संदेश आन्सरिंग मशीनवर दुसरे दिवशी मुंबईला गेल्यावर ऐकायला मिळाले. म्हणजे एकूण एकच!

घरातल्या संगणकाचे बोट धरून आपला आंतर्जालावर प्रवेश झाला आणि संदेशवहनाचे एक आगळेच दालन उघडले. टेलीफोनची सुविधा सुलभ झाल्यनंतर टपालाने पत्रे पाठवणे कमीच झाले होते. नव्या पिढीच्या मुलांना तर पत्रलेखनाची कलाच फारशी अवगत झाली नसेल. पण ईमेल सुरू होताच कधीही पत्र न पाठवणारेसुद्धा उत्साहाने चिठ्ठ्या खरडू लागले. चॅटिंगबरोबर त्यासाठी वेगळी भाषाच तयार झाली. यात व्याकरणाचे सारे नियम धाब्यावर बसवून शब्दांमधील अक्षरेसुद्धा गाळून फक्त आद्याक्षरांचा उपयोग होतो. कुठे अक्षरांऐवजी अंक वापरले जातात आणि विरामचिन्हांचा भरपूर वापर होतो. आधी विरामचिन्हांमधून राग, प्रेम, हंसू वगैरे सूचित केले जाई, आतां हंसरे, रडके, रुसलेले, खदखदणारे चेहेरेसुद्धा दाखवले जातात. या सर्वांबरोबर शुभेच्छापत्रांची एक लाटच आली आहे. चित्रमय कार्डांपासून त्याची सुरुवात झाली. नंतर ती चित्रे हलू लागली व बोलूसुद्धा लागली. शब्द, चित्रे आणि स्वर यंच्या मिश्रणातून अफलातून संदेश पाठवले जातात. त्यातसुद्धा मुलांसाठी, मित्रमैत्रिणीसाठी, आईवडिलांसाठी, शिक्षकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे शुभसंदेश त्यांच्या जन्मतारखेला पाठवले जाऊ लागले आहेत. माझ्याकडील एका संदेशात तर मुलाने आईला व सुनेने सासूला एकत्र शुभचिंतन केले आहे.
. . . . . . . . . . . (क्रमशः)

Sunday, July 12, 2009

एक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६)

त्या चिरस्मरणीय दिवसाला आता बरोबर तीन वर्षे होऊन गेली असली तरी तो अजून काल परवा होऊन गेल्यासारखा वाटतो. त्या दिवसाची आठवण त्या काळी लिहिलेल्याच शब्दात देत आहे.

समजा एकादा माणूस महिना दीड महिना गंभीर आजाराने अंथरुणाला खिळून आहे, त्यातून सावरतांना त्याच्या एका हाताने भिंतीला धरून हळू हळू एक एक पाऊल टाकीत बेडरूमपासून दिवाणखान्यापर्यंत धडपडत येण्याचे सुध्दा एखाद्या वर्षभराच्या बाळाने केलेल्या प्रगतिसारखे तोंड भरभरून कौतुक होते आहे, जागीच बसल्या बसल्या कांही करावे म्हंटले तर दीड महिन्यापासून त्याच्या कॉंप्यूटरनेही दगा दिला आहे, अशा परिस्थितीत त्याचा एक संपूर्ण दिवस अतिशय धामधुमीचा गेला असे होऊ शकेल? काल माझ्या बाबतीत अगदी अस्संच झालं.

कालचा दिवस थोडा वेगळा होताच, काल गुरुपौर्णिमा होती. मला जरी कोणी गुरु मानत नसले तरी काय झालं, मी तर अनेक लोकांना आपले चेले समजतो आणि जमले तर प्रत्यक्ष भेटीत नाहीतर निदान फोनवर तरी त्यांना अनाहूत सल्ले द्यायचे सत्कार्य अधून मधून करीतच असतो. पण काल मात्र या कामासाठी माझा फोनच मुळी माझ्या हाती लागत नव्हता. त्याचं काय आहे की माझ्या सौभाग्यवती परंपरांना जिवापाड जपणा-या संगीताच्या क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचे आजी व माजी गुरु, गुरुबंधू, गुरुभगिनी, शिष्यवर्ग, कदाचित शिष्यबंधुभगिनीसुद्धा असतील, या सर्व लोकांबरोबर दिवसभर त्यांची उभयपक्षी फोनाफोनी होत राहिली. योगायोगाने कालच माझ्या धांकट्या मुलाचा वाढदिवस होता व तो दीड वर्षानंतर नुकताच सुटीवर मायदेशी आलेला. त्यामुळे या निमित्ताने त्याचे अभीष्टचिंतन करून त्याच्याबरोबर दीड वर्ष सांचलेल्या मनसोक्त गप्पागोष्टी करण्यांत आमच्या नातलगांची अहमहमिका लागलेली होती. या सर्वांकडून माझ्या तब्येतीची चौकशी सुद्धा व्हायची. त्यामुळे त्यांचेबरोबर माझेही मधून मधून फोनवर बोलणे व्हायचेच. एकूण सांगायचे तात्पर्य म्हणजे आमचा फोन दिवसभर सतत गुंतलेला होता. त्यामुळे माझे सगळेच चेले मात्र माझ्या तांवडीत न सांपडता बचावले.

माझ्या प्रकृतिअस्वास्थ्याचा विचार करतां मुलाच्या वाढदिवसाला या वर्षी आम्हा सर्वांना कुठे बाहेर जाणे शक्यच नव्हते. त्यामुळे घरीच मेजवानी करून आपल्या परीने तो साजरा करणे क्रमपात्र होते. शिवाय अगदी घरच्यासारखे असलेले आप्तेष्ट या वेळी घरी भेटायला येणार हे नक्की होते. त्यांचे तोंड गोड करायला पाहिजे हे ओघाने आलेच. त्यामुळे सर्वांशी सविस्तर विचारविनिमय करून सर्वांच्यासाठीच चांगले स्वादिष्ट, सात्विक व पौष्टिक तसेच तबेतीसाठी सुरक्षित असे अन्नपदार्थ निवडून ते कोठकोठून मागवायचे, आणावयाचे किंवा बनवायचे याचे नियोजन केले गेले.

दीड महिना इंटरनेट न पाहिल्याने त्यासाठी बोटे शिवशिवत होती. कांहीही करून आपला संगणक कार्यान्वित करायचा आणि आपण वर्षारंभाला सुरू केलेल्या ब्लॉगवर तो मृत कॅटेगरीमध्ये घोषित होण्यापूर्वीच गुरुपौर्णिमेच्या सुमुहूर्तावर त्यावर पुढचा भाग लिहायचाच असा निर्धार मी केला होता. त्यासाठी एका संगणकतज्ञाचा फोनवरूनच पिच्छा पुरवला होता. दोन तीन वेळा त्याचे तंत्रज्ञ येऊन पाहून गेले होते. पण दर वेळी त्यांना एखाद्या चिप किंवा कार्डामध्ये कांही ना कांही दोष आढळायचा व ते स्पेअरमध्ये आहेत कां याची चौकशी ते करायचे, कधी खोडरबर, कधी ब्लेडचे पाते तर कधी प्लायर मागायचे. शेवटी मी वैतागून त्यांच्या मालकाला झाडले आणि मी कांही कॉंम्प्यूटरचा वर्कशॉप चालवीत नाही याची आठवण त्याला करून दिली. माझ्याकडे वाटले तर माझे आयडेंटिटी कार्ड मिळेल, एखादे क्रेडिट कार्ड असेल, झालेच तर रेशन कार्ड असेल पण कॉंप्यूटराचे कार्डस मी कशाला जवळ ठेवीन? तसेच, वाटले तर अंकल चिप्स किंवा लेहर कुरकुरे शेजारच्या वाण्याकडून मागवून घेईन पण कॉंप्यूटरमधल्या मायक्रोचिप्स कशाशी खातात ते इथे कुणाला माहीत आहे?

या वेळी मात्र ते लोक हांतातल्या बॅगेत अनेक प्रकारचे सुटे भाग व विविध हत्यारे, एक नवीन की बोर्ड आणि नवे कोरे स्कॅनर कम प्रिंटर कम झेरॉक्स मशीन वगैरे सगळे घेऊन आले हे पाहून मला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. मला माझ्या नोकरीमधील पहिला दिवस आठवला. त्या दिवशी मी ऑफीसच्या कॉमन हॉलमध्ये कुठेतरी टेकायला सोयिस्कर जागा मिळते कां या शोधांत होतो, पण कागदपत्रांच्या फक्त कृष्णधवल नक्कला देऊ शकणा-या एका बोजड झेरॉक्स मशीनने मात्र एक आलीशान एअरकंडीशन्ड खोली व्यापलेली होती. तिथे अनुज्ञेशिवाय कोणालाही प्रवेश सुद्धा मिळत नव्हता. त्या काळी रस्तोरस्ती कॉपियर्सचे पेव फुटलेले नव्हते आणि अशा प्रकारचे यंत्र असू शकते हेच मुळी लोकांना माहीत नव्हते. त्यामुळे आमच्या ऑफीसांत असे अद्ययावत इम्पोर्टेड मशीन आहे हे किती तरी दिवस मी फुशारकी मारून अज्ञ लोकांना सांगत होतो. आणि आज त्यापेक्षा कितीतरी सुधारलेले बहुगुणी पण छोटेसे यंत्र चक्क माझ्या घरांतल्या टेबलावर विसावणार होते. पण इतकी जय्यत तयारी करून सुद्धा शेवटी माझा दोन अडीच वर्षे जुना संगणक व ते आधुनिक यंत्र यांच्या कुंडल्या कांही जुळल्या नाहीत. सरतेशेवटी मोठ्या कष्टी मनाने मी त्या मेकॅनिकांना ते दोन्ही उचलून आपल्या कार्यशालेत नेऊन तिथेच हा घोळ सोडवायला सांगितले. पण माझ्या निर्धाराचे काय? शरीर व्याधीग्रस्त असले तरी मनाची उभारी अजून शाबूत होती. उलट ते अधिकच हट्टी झाले होते. मुलाने केवळ त्याच्या महत्वाच्या सॉफ्टवेअरच्या कामासाठी खास राखून ठेवलेला त्याचा लॅपटॉप मागून घेतला. त्या संगणकाला फक्त आंग्लभाषा अवगत होती आणि त्याला मराठी कशी शिकवावी हे मला माहीत नव्हते. त्यामुळे गुरुपौर्णिमेबद्दल इंग्रजीमध्येच चार वाक्ये लिहून काढली.

ब्लॉगवर जेमतेम चार वाक्ये लिहून होत असतांनाच पुन्हा एकदा टेलीफोन खणखणला. या वेळेस पुण्याला ऑफीसच्या कामासाठी गेलेल्या मोठ्या मुलाचे कातर आवाजातील हॅलो कानी आले. आम्ही केंव्हापासून आतुरतेने त्याच्या परतीची वाट पहात होतो. कदाचित थोड्याच वेळांत आपण पोचत आहोत, येतांना बाजारातून कांही आणायचे आहे कां असे त्याला विचारायचे असेल असे आधी वाटले. पण असा कातर आवाज कां? त्याने अतिशय अधीर स्वरांत मुंबईतील सद्यपरिस्थितीची चौकशी केली. मला कांहीच उमजेना. कारण या सगळ्या गडबडीत रोज टेलीव्हिजन समोर ठिय्या मारून बसणा-या मला या वेळेस त्याची आठवण सुद्धा झाली नव्हती व त्यामुळे घराबाहेर आजूबाजूला काय चालले होते याचे यत्किंचित भान नव्हते. लगेच सा-या जणांनी टी.व्ही.समोर धांव घेतली. कांही मिनिटांपूर्वी मुंबईच्या लोकल गाड्यांमध्ये झालेल्या बॉंबस्फोटांच्या मालिकेची ब्रेकिंग न्यूज व त्याची हृदयद्रावक दृष्ये सगळ्या चॅनेल्सवर दिसत होती.

या धक्क्यामधून भानांवर येऊन कांही उत्तर देण्याआधीच टेलीफोनचा संपर्क तुटला होता. माझा मुलगा या क्षणी कुठे आहे हे सुद्धा समजले नव्हते. त्याने कोठल्या तरी अनोळखी नंबरावरून, बहुतेक कुठल्या तरी अनोळखी गांवातील बूथवरून फोन लावला असावा असे कॉलर आयडी वर दिसणा-या आंकड्यावरून दिसत होते. त्यानंतर पुन्हा कांही त्याचेबरोबर संपर्क जुळत नव्हता. पुणे मुंबई रस्ता पश्चिम रेल्वेपासून खूपच दूर अगदी वेगळ्या वाटेला आहे हे समजत होते. पण अशी मोठी घटना एका ठिकाणी होऊन गेल्याचा धक्काच इतका जबरदस्त होता की याच वेळी इतर ठिकाणी काय काय चालले असेल याची चिंता वाटत होती. शिवाजी पार्कवर घडलेल्या एका वाईट घटनेचे ठाणे कल्याण डोंबिवलीपर्यंत उमटलेले तीव्र प्रतिसाद दोनच दिवसापूर्वी पाहिले होते. पण आता मुलाच्या परतण्याची अधीरपणे वाट पहात बसण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तो सुखरूपपणे घरी येऊन पोचल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला.

त्या आधीच हातात टेलीफोन नंबरांची वही घेऊन मुंबईतील आप्तेष्टांना फोन लावणे सुरू झाले होते. आमचे कांही जवळचे आप्त मुंबईच्या पश्चिम उपनगरांत रहात होते तर कांहीजण कामासाठी रोज तेथे जायचे. त्या सर्वांची काळजी होती. पण बहुतेक ठिकाणी फोन लागतच नव्हते. कदाचित टेलीफोन सिस्टिम्स जॅम असतील किंवा वाहतूक बंद पडल्याने ते लोक वेळेवर घरी पोचले नसतील असा विचार करून पुढला नंबर फिरवायचा. मध्येच एकादा नंबर लागायचा किंवा दुस-या कोणाचा तरी फोन यायचा. धडधडत्या अंतःकरणाने बोलल्यावर त्याच्या कडून तिस-या कोणाची खुषाली कळायची. त्यातून थोडासा रिलीफ मिळायचा. असे करीत करीत रात्री उशीरापर्यंत आपले बहुतेक सर्व लोक सुखरूप असल्याचे कळून जीव भांड्यात पडला. देवाच्या कृपेने आपण यातून कसे थोडक्यांत बचावलो याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी कहाणी होती.

वाढदिवसाच्या घरगुती समारंभाची सगळी तयारी आधीपासून केलेली होती, सगळे खाद्यपदार्थ घरी आले होते व सारी अपेक्षित मंडळीही थोडी उशीरा कां होईना पण एकत्र जमली होती. ती येईपर्यंत त्यांची वाट पाहणे आवश्यक होतेच, समारंभ साजरा करण्याच्या मनःस्थितीत कोणीही नव्हते. पण परिस्थितीचे आकलन न झाल्यामुळे केक कांपायची घाई करणा-या बाळगोपाळांना आवर घालणे कठीण होत होते. यामुळे अखेर त्या समारंभाची औपचारिकता कशीबशी पूर्ण करून टाकावी लागली.

शेवटी झोपतांना मनांत विचार आला, "कसला हा दिवस? अनेक लोकांबरोबर शुभेच्छा, अभीष्टचिंतन यांचे आदान प्रदान व हंसत खेळत गप्पागोष्टी, अंगांत त्राण नसतांना निव्वळ उत्साहापोटी केलेली केवढी मोठी हालचाल, आशा निराशा यांचा लपंडावाचा खेळ, मन उद्विग्न करणा-या भयानक घडामोडी, हृदयद्रावक दृष्ये पाहून झालेले दारुण दुःख, त्यातून निर्माण झालेली जीवघेणी चिंता, शेवटी त्यातून मुक्ती, आधी मोठ्या हौसेने ठरवलेला पण मन घट्ट करून कसाबसा आटोपून घेतलेला एक औपचारिक समारंभ, इतक्या सगळ्या गोष्टी एकांच दिवसांत घडाव्यात ?"

Saturday, July 11, 2009

जन्मतारीख - भाग ३


एकदा गणेशोत्सवासाठी पुण्याला गेलो होतो, पण तो संपल्यानंतर माझा वाढदिवसही तिथेच साजरा करून मुंबईला परतायचा आग्रह माझ्या मुलाने धरला म्हणून तिथला मुक्काम आणखी वाढवला. वाढदिवस कसा साजरा करायचा यावर चर्चा सुरू झाली. त्या दिवशी सर्वांनी महाबळेश्वरला जाऊन येण्याचा एक प्रस्ताव समोर आला तसेच त्या दिवशी शिरडीचा जाऊन यायचा दुसरा. महाबळेश्वरला किंवा कोठल्याही थंड हवेच्या ठिकाणी गेल्यास तिथल्या रम्य निसर्गाची सकाळपासून संध्याकाळपर्यंत बदलत जाणारी रूपे पाहून घ्यायला हवीत, तिथली अंगात शिरशिरी आणणारी रात्रीची थंडी अनुभवायला पाहिजे तसेच सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांचा उबदारपणा जाणून घ्यायला हवा, शुद्ध हवा फुफ्फुसात भरून घ्यायला पाहिजे तसेच निसर्गाचे संगीत कानात साठवून घ्यायला हवे. हे सगळे करण्यासाठी पुरेसा निवांत वेळ द्यावा लागतो. धांवत पळत कसेबसे तिथे जाऊन पोचायचे आणि भोज्ज्याला शिवल्यागत करून घाईघाईने परत फिरायचे याला माझ्या लेखी कांही अर्थ नाही. शिरडीला हल्ली भक्तवर्गाची भरपूर गर्दी असते म्हणतात. त्यात सुटीच्या दिवशी तर विचारायलाच नको. तिथेही धांवतपळत जाऊन उभ्या उभ्या दर्शन घेऊन लगेच परत फिरावे लागले असते. मला साईनाथापुढे कसले गा-हाणे गायचे नव्हते की मागणे मागायचे नव्हते. त्यापेक्षा "मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही ।। " असे म्हणणे मला अधिक श्रेयस्कर वाटते.

अशा कारणांमुळे मी दोन्ही प्रस्तावांना संमती दिली नाही. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी काय करायचे ते ठरवण्याचा माझा हक्क इतरांना मान्य करावाच लागला. पुण्याच्या वेशीच्या अगदी आंतबाहेरच कांही निसर्गरम्य विश्रांतीस्थाने (रिसॉर्ट्स) बांधली गेली आहेत असे ऐकले होते. त्यातल्याच एकाद्या जागी जावे, दिसतील तेवढ्या वृक्षवल्ली पहाव्यात, सोयरी वनचरे दिसण्याची शक्यता कमीच होती पण पक्ष्यांच्या सुस्वर गायनाचा नाद ऐकून घ्यावा आणि एक दिवस शांत आणि प्रसन्न वातावरणात घालवावा असा प्रस्ताव मी मांडला आणि सर्वानुमते तो संमत झाला.

दोन ऑक्टोबरचा दिवस उजाडल्यानंतर प्रत्यक्षात मात्र त्या दृष्टीने कोणीही कसलीही हालचाल करतांना दिसला नाही. "ऑफिस आणि शाळांच्या वेळा सांभाळायची दगदग तर रोजचीच असते, सुटीच्या दिवशी तरी त्यातून सुटका नको कां?" अशा विचाराने घरातले सगळे लोक उशीरापर्यंत अंथरुणात लोळत पडून राहिले. शिवाय "सुटीच्या दिवशी लवकर उठायची घाई नाही" म्हणून आदल्या रात्री सिनेमे वगैरे पहात जरा जास्तच जागरण झाले होते आणि जास्त वेळ झोपून राहण्यासाठी एक भूमिकासुद्धा तयार झाली होती. एकेकजण उठल्यानंतर त्यांची नित्याची कामेसुद्धा संथपणे चालली होती. घरकाम करणा-या बाईला याची पूर्वकल्पना असावी किंवा तिच्या घरीसुद्धा संथगतीची चळवळ (गो स्लो) सुरू असावी. माध्यान्ह होऊन गेल्यानंतर ती उगवली. ज्या वाहनचालकाच्या भरंवशावर आमचे इकडे तिकडे जाण्याचे विचार चालले होते तो तर अजीबात उगवलाच नाही. त्याने सार्वत्रिक सुटीचा लाभ घेतला असावा. वेळेअभावी रेंगाळत ठेवलेली घरातली कांही फुटकळ कामे कोणाला आठवली तसेच कांही अत्यावश्यक पण खास वस्तूंची खरेदी करायला तोच दिवस सोय़िस्कर होता. एरवी रविवारी दुकाने बंद असतात आणि इतर दिवशी ऑफीस असते यामुळे ती खरेदी करायची राहून जात होती. माझ्याप्रमाणेच माझ्या मुलालाही पितृपक्षाचे वावडे नसल्यामुळे खरेदी करण्याची ही सोयिस्कर संधी त्याने सोडली नाही.

महात्मा गांधीजींच्या जन्मदिवशी त्यांनी सांगितलेली शिकवण थोडी तरी पाळायला हवी. शिवाय वाढदिवसाच्या दिवशी शहाण्यासारखे वागायचे असे संस्कार माझ्या आईने लहानपणीच मनावर केले होते. कुठेतरी जाऊन आराम करण्यासाठी आधी घरी घाईगर्दी करायला कोणाला सांगणे तसे योग्य नव्हतेच. त्यामुळे मी आपले कान, डोळे आणि मुख्य म्हणजे तोंड बंद ठेऊन जे जे होईल ते ते स्वस्थपणे पहात राहिलो. वेळ जाण्यासाठी मांडीवरल्याला (लॅपटॉपला) अंजारत गोंजारत गांधीजयंतीवर एक लेख लिहून काढला आणि तो ब्लॉगवर चढवून दिला.

अखेर सगळी कामे संपवून आणि सगळ्यांनी 'तयार' होऊन घराबाहेर पडेपर्यंत संध्याकाळ व्हायला आली होती. यानंतर त्या रिसॉर्टपर्यंत पोचल्यानंतर काळोखात कुठल्या वृक्षवल्ली दिसणार होत्या? त्या रम्य आणि वन्य जागी रात्री खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था असते की नाही ते नक्की माहीत नव्हते. त्याऐवजी थोडा वेळ इकडे तिकडे एखाद्या बागबगीचात फिरून जेवायला चांगल्या हॉटेलात जाण्यावर विचार झाला. पण माझी पुण्याबद्दलची माहिती चाळीस वर्षांपूर्वीची होती. कॉलेजला असतांना आम्ही ज्या उपाहारगृहांना आवडीने भेट देत होतो त्यातली डेक्कन जिमखान्यावरील 'पूनम' आणि 'पूना कॉफी हाउस', टिळक रस्त्यावरील 'जीवन', शनीपाराजवळील 'स्वीट होम ' अशी कांही नांवे अजून स्मरणात असली तरी आतापर्यंत ती हॉटेले टिकून आहेत की काळाच्या किंवा एकाद्या मॉलच्या उदरांत गडप झाली आहेत ते माहीत नव्हते. आजही ती चालत असली तरी त्यांचे आजचे रूप कसे असेल ते सांगता येत नव्हते. पुण्यात नव्यानेच स्थाईक झालेल्या माझ्या मुलाच्या कानांवर तरी ती नांवे पडली होती की नाही याची शंका होती. गेल्या चार दशकांच्या काळात तिथे कितीतरी नवी खाद्यालये उघडली आणि नांवारूपाला आली असली तरी माझा मुलगा मुख्य गांवापासून दूर वानवडीला रहात असल्यामुळे त्याला याबद्दल अद्ययावत माहिती नव्हतीच. त्यातून पुण्याला आल्यावर पहिल्याच आठवड्यात आम्ही एका नव्या उपाहारगृहात जाऊन स्पॅघेटी, मॅकरोनी, सिझलर वगैरेंच्या हिंदुस्थानी आवृत्या खाऊन आलो होतो. त्यानंतर गणेशोत्सवात डेक्कन जिमखान्यावरील श्रेयस हॉलमध्ये मराठी जेवणाचा महोत्सव चालला होता. त्याला भेट देऊन तळकोकणापासून महाविदर्भापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या खास खाद्यपदार्थांचा समाचार घेऊन आलो होतो. त्यामुळे आता आणखी वेगळा कोणता प्रकार चाखून पहावा असा प्रश्न पडला. अखेरीस एका राजस्थानी पद्धतीच्या आधुनिक रिसॉर्टला भेट देण्याचे निश्चित झाले. त्याचे नांव होते "चोखी ढाणी."

. . . . . . . . . . . . (क्रमशः)

जन्मतारीख - भाग २


शालांत परीक्षा पास झाल्यानंतर शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र शाळेकडून मिळाले. त्यात माझे जन्मस्थान आणि जन्मतारीख या दोन्हींची नोंद होती. जन्मतारीख वाचल्यावर मी तर टाणकन उडालो. दोन ऑक्टोबर ! म्हणजे गांधीजयंती ! इतके दिवस मला हे कुणीच कसे सांगितले नाही? माझ्या जन्माच्या आधीच गांधीजी महात्मा झाले असले तरी पारतंत्राच्या त्या काळात त्यांच्या जन्मतारखेला कदाचित इतके महात्म्य आले नसेल. त्या दिवशी सुटी असणे तर शक्यच नव्हते. त्यामुळे ते त्या वेळेस कोणाच्या ध्यानात आलेच नसेल किंवा नंतर कधी जन्मतारखेचा विषयच न निघाल्याने हा योगायोग सगळे विसरून गेले असतील. वाढदिवसासाठी तिथीलाच महत्व असल्याकारणाने "आपली दुर्गी अष्टमीची" किंवा "पांडोबा आषाढी एकादशीचे" असल्या गोष्टींचा बोलण्यात उल्लेख होत असे, पण जन्मतारखेच्या बाबतीत तसे होत नसे.

दर वर्षी दोन ऑक्टोबरला आमच्या शाळेला सुटी तर असायचीच, शिवाय सूतकताई, सभा, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे गोष्टी शाळेत होत असत. त्यात गांधीजींच्या जीवनातल्या विविध प्रसंगावरील नाटुकल्या होत, निबंध किंवा वक्तृत्वाच्या स्पर्धा ठेवल्या जात, "ती पहा ती पहा बापूजींची प्राणज्योती । तारकांच्या सुमनमाला देव त्यांना अर्पिताती ।।" यासारख्या कविता आणि "सुनो सुनो ऐ दुनियावालों बापूजीकी अमर कहानी" यासारखी गाणी म्हंटली जात असत. त्याच दिवशी माझीसुद्धा 'जयंती' आहे हे सांगून मला केवढा भाव मिळवता आला असता ! पण आता त्याचा काय उपयोग?

शाळेत असेपर्यंत मी हॉटेलची पायरीसुद्धा चढलेली नसली तरी हॉस्टेलमध्ये गेल्यावर तीन्ही त्रिकाळच्या खाण्यासाठी मेसवरच विसंबून होतो. तिथला आचारी कुणाकुणाच्या वाढदिवसाला त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करणार? शिवाय हाताशी पंचांगच नसल्यामुळे आपली जन्मतिथी कधी येऊन गेली तेसुद्धा कळायला मार्ग नव्हता. माझी जन्मतारीख मला आता समजली होती, पण त्याचा एवढा उपयोग नव्हता. तारखेनुसार वाढदिवस साजरा करण्याचा प्रघात अजून अंगात मुरला नव्हता. माझ्या मित्रमंडळातली सगळीच मुले लहान गांवांतून आलेली होती. त्यांच्या घरी खायलाप्यायला मुबलक मिळत असले, त्यात कसली ददात नसली तरी शहरातल्या खर्चासाठी पैसे उचलून देण्यात अडचणी होत्या. त्यामुळे शिक्षण आणि जीवन यांसाठी लागणा-या आवश्यक गोष्टी मिळवता मिळवताच नाकी नऊ येत असत. चार मित्रांना सोबत घेऊन त्यांना सिनेमा दाखवणे किंवा आईस्क्रीमची ट्रीट देणे हा चैनीचा किंवा उधळपट्टीचा अगदी कळस झाला असता. अशा परिस्थितीत कोणीही 'बर्थडे पार्टी ' कुठून देणार. तोपर्यंत तसा रिवाजच पडला नव्हता. त्यामुळे फार फार तर एकाद्या जवळच्या मित्राला बरोबर घेऊन माफक मौजमजा करण्यापर्यंतच मजल जात होती.

मुंबईला बि-हाड थाटल्यानंतर मुलांचे वाढदिवस मात्र तारखेप्रमाणेच आणि हौसेने साजरे करायला सुरुवात झाली. सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे रंगीबेरंगी पताका भिंतीवर लावणे, फुगे फुगवून टांगणे वगैरे करून दिवाणखाना सजवला जायचा. केकवर मेणबत्त्या लावणे, सगळ्यांनी कोंडाळे करून 'हॅपी बर्थडे'चे गाणे म्हणणे, मेणबत्त्यांवर फुंकर घालून केक कापणे इत्यादी सोपस्कार सुरू झाले. बिल्डिंगमधली आणि जवळपास राहणारी बच्चेमंडळी यायची. त्यांच्यासाठी खेळ, कोडी वगैरे तयार करायची, नाच व गाणी व्हायची. त्यानिमित्त्याने लहान मुलांच्या घोळक्यात आम्हीसुद्धा समरस होऊन नाचून घेत असू.

वीस पंचवीस वर्षाच्या काळात पुन्हा एकदा पिढी बदलली असली तरी वाढदिवसाचे हे स्वरूप जवळ जवळ तसेच राहिले आहे. त्यातील तपशीलात मात्र बराच फरक पडला आहे. पूर्वीच्या काळी लहान घर असले आणि त्यात जास्त माणसे रहात असली तरी आम्ही मुलांचे वाढदिवस घरातल्या पुढच्या खोलीतच दाटीवाटी करून साजरा करीत असू. वेफर्स किंवा काजूसारखे अपवाद सोडल्यास खाण्यापिण्याचे बहुतेक पदार्थ घरीच तयार होत असत. अगदी केकसुद्धा घरीच भाजला जाई आणि त्यावरील आईसिंगचे नक्षीकाम करण्यात खूप गंमत वाटत असे. मॉँजिनीजच्या शाखा उघडल्यानंतर तिथून केक यायला लागला. बंगाली संदेश, पंजाबी सामोसे, ओव्हनमधले पॅटिस वगैरे गोष्टी बाहेरून मागवल्या जाऊ लागल्या. तरीसुद्धा या प्रसंगाच्या निमित्याने चार लोकांनी आपल्या घरी यावे आणि त्यांनी आपल्या हातचे कांही ना कांही खावे अशी एक सुप्त भावना मनात असायची. आता ती भावना लुप्त होत चालली आहे. घरात प्रशस्त दिवाणखाना असला आणि कमी माणसे रहात असली तरी बाहेरच्या लोकांनी येऊन तिथे भिंतीला डाग पाडू नयेत, मुलांनी पडद्यांना हात पुसू नयेत आणि एकंदरीतच घरात पसारा होऊ नये म्हणून आजकाल बरेक लोक बाहेरचा हॉल भाड्याने घेतात. खाण्यापिण्याच्या वस्तू परस्पर तिथेच मागवतात आणि घरातली मंडळी देखील पाहुण्यांप्रमाणे सजूनधजून तिकडे जातात. तिथल्या गर्दीत बोलणे बसणे होतच नाही. कधीकधी तर आलेल्या गिफ्टवरचे लेबल पाहून ती व्यक्ती येऊन गेल्याचे उशीराने लक्षात येते.

आमचे स्वतःचे वाढदिवस मात्र कधी घरीच गोडधोड खाऊन तर कधी बाहेर खायला जाऊन आम्ही साजरे करीत असू. हळूहळू घरी कांही बनवणे कमी होत गेले आणि बाहेर जाण्याचे प्रमाण वाढत गेले. त्यातसुद्धा सुरुवातीच्या काळातल्या डोसा-उत्तप्पाच्या ऐवजी छोले भटूरे, पनीर टिक्का मसाला किंवा बर्गर-पीझ्झा किंवा नूडल्स-मांचूरिया वगैरे करीत सिझलर्स, पिट्टा वगैरेसारखे पदार्थ येत गेले. अलीकडच्या काळात वयोमानानुसार खाण्यापिण्यावर बंधने पडत गेली आणि स्वतः खाण्यात मिळणा-या आनंदापेक्षा इतरांना चवीने मनसोक्त खातांना त्यांच्या चेहे-यावर फुललेला आनंद पाहतांना अधिक मजा वाटू लागली आहे.
. . . . . . . . . . . . . . . . .. (क्रमशः)

Thursday, July 09, 2009

जन्मतारीख - भाग १


लहानपणचा वाढदिवस
आजकालची लहान मुले आपले नांव सांगायला लागतात त्याच्यापाठोपाठच आपली जन्मतारीखसुद्धा सांगायला शिकतात असे दिसते. आमच्या ईशा आणि इरा यांना आपापल्या नांवांमधल्या श आणि र चा उच्चारसुद्धा नीट जमत नव्हता तेंव्हापासून त्या "सोळा जूनला माझा बड्डे आहे." असे सांगायच्या. 'सोळा' ही एक 'संख्या' आहे आणि 'जून' हे एका 'महिन्या'चे नांव आहे एवढेसुध्दा कळण्याइतकी समज त्यांना तेंव्हा आलेली नव्हती, कारण संख्या किंवा महिना या संकल्पनाच त्यांना कळलेल्या नसाव्यात, पण 'बड्डे' म्हणजे 'धमाल' एवढे त्यांना पक्के समजलेले होते. त्यामुळे ते नेहमी नेहमी येत रहावेत असे त्यांना वाटत असे. अधून मधून त्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या बर्थडे पार्ट्यांना जाऊन तिथे धमाल तर करायच्याच, इतर दिवशी आपल्या भातुकलीच्या खेळात मिकी उंदीरमामा, टेडी अस्वल किंवा बार्बी भावली यांचे वाढदिवस 'मनवत' असत.

मला मात्र शाळेतून बाहेर पडेपर्यंत माझी जन्मतारीख माहीत सुध्दा नव्हती. सर्व प्रसिध्द लोकांना असते तशी मलासुद्धा एक जन्मतारीख असायला हवी अशी अनामिक जाणीव मला दहा बारा वर्षाचा झाल्यानंतर झाली होती, पण ती तारीख नेमकी कोणती आहे हे मात्र कळले नव्हते. माझ्याच जन्मतारखेचे कांही गूढ होते अशातला भाग नाही, कारण त्या काळात घरातल्या कुणालाच कुणाचीच जन्मतारीख माहीत नव्हती. किंबहुना त्या काळात जन्मतारीख या विषयाचा बोलण्यात कधी उल्लेखच होत नसे. मोठ्या माणसांची वाढ होणेच थांबलेले असेल तर त्यांचा वाढदिवस कसला करायचा? लहान मुलांचे वाढदिवस तिथीनुसार येत. पण ते 'साजरे' केले जात असे म्हणणे आजच्या काळात धार्ष्ट्याचे होईल कारण त्या दिवशी घरात कसलाही समारंभ, गडबड, गोंधळ वा गोंगाट होत नसे.

तरीसुद्धा मला माझा वाढदिवस येण्याची खूप आतुरता वाटत असे. गणपतीचा उत्सव झाला की मला पक्षपंधरवड्याचे वेध लागत असत. हे दिवस मला कधीच 'अशुभ' वाटले नाहीत. मोठा झाल्यानंतरसुध्दा घरातल्या कित्येक वस्तू मी याच काळात विकत आणल्या आणि माझ्यासारख्याच त्यासुद्धा ब-यापैकी चालल्या ! जन्मतिथीच्या एक दोन दिवस आधी ट्रंकेतले नवे कोरे कपडे काढून त्यातले कोणते कपडे त्या दिवशी घालायचे ते ठरवायचे. एकत्र कुटुंबांमधील घरातल्या सगळ्या मुलांसाठी ऊठसूट नवे कपडे त्या काळात शिवले जात नव्हते. पुण्यामुंबईकडे रेडीमेड कपडे विकत मिळतात असे नुसते ऐकले होते. आमच्या गांवात ड्रेसेसचे दुकान अजून उघडले गेले नव्हते. एकेका मुलासाठी वेगळ्याने त-हेत-हेचे कपडे शिवणे कल्पनेच्या पलीकडे होते. घरातल्या सरसकट सगळ्यांसाठी नवे कपडे शिवून आणल्यावर ते ट्रंकेत भरून ठेवले जात. सणवार, लग्नकार्य अशा प्रसंगी कांही वेळा घालून झाल्यानंतर यथावकाश गरजेनुसार ते रोजच्या वापरात येत असत. वाढदिवस हा खास माझा असल्यामुळे त्यासाठी फक्त माझे नवे कपडे ट्रंकेतून बाहेर निघत, याचे अप्रूप वाटायचे.

वाढदिवसाच्या दिवशी सकाळी दिवाळीप्रमाणे अंगाला सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करायचे, कोरे कपडे अंगावर चढवायचे, कोणाच्या तरी मुंजीत घरी आलेली एकादी जरीची टोपी डोक्यावर ठेवायची आणि देवाला नमस्कार करून पाटावर बसायचे. प्रौक्षण वगैरे करून झाल्यावर घरातल्या सगळ्या मोठ्यांच्या पाया पडायचे. मोठी माणसे "मोठा हो, शहाणा हो, उदंड आयुष्यवंता हो." असे तोंडभर आशीर्वाद देत आणि मोठी भावंडे या निमित्याने पाठीत धपाटा घालून घेत. पण या दिवशी त्यावरून मारामारी करायची नाही, चिडायचे नाही, रडायचे नाही, हट्ट किंवा आक्रस्ताळेपणा करायचा नाही, शहाण्यासारखे चांगले वागायचे वगैरे ठरलेले असे.

सुसंस्कृत लोकांना बायकांमुलांसह एकत्र बसून जिथे खातापिता येईल अशा प्रकारचे हॉटेल आमच्या लहान गांवात अजून उघडलेले नव्हते. गरजू व शौकीन लोकांना चहा, चिवडा, भजी वा मिसळ वगैरे पुरवणा-या ज्या जागा होत्या तिथे फक्त उडाणटप्पू लोक वात्रटपणा करण्यासाठी जातात अशी आमची पक्की समजूत करून दिलेली असल्यामुळे लहानपणी कधीही तिथे पाऊलदेखील टाकले नव्हते. त्यामुळे आमचे खाद्यजीवन घरी तयार होत असलेल्या खाद्यपदार्थांपर्यंतच मर्यादित होते. कांही विशिष्ट बाबतीत ते आजच्यापेक्षा अधिक समृद्ध असले तरी त्याचा एकंदरीत आवाका लहान वयाला साजेसाच असायचा. त्या काळात ज्या मुलाचा वाढदिवस असे त्याच्या आवडीचे शक्य तितके पदार्थ जेवणात असत. जेवणात पंक्तीप्रपंच आणि मर्यादा नसल्याने ते सर्वांसाठी पोटभरच असत. वाढदिवस ज्याचा असेल त्याला अधिक आग्रहाने खाऊ घातले जाई एवढेच.पण हे सगळे घरातल्या घरातच होत असे. त्या दिवशी बाहेरच्या इतर कुणाला आमंत्रण वगैरे दिले जात नसे. त्यामुळे भेटवस्तू देणे घेणे वगैरे प्रकार नव्हतेच. दिवसभर घराचे दरवाजे उघडेच असल्याने या ना त्या निमित्याने कोणी ना कोणी येत असे. त्यांना त्या दिवशी बनवलेल्या खास पदार्थाचा वाटा अनायास मिळून जात असे. इतर लोकांना या वाढदिवसाची खबरबात समजणे जवळजवळ अशक्य होते. तरीसुद्धा आपला वाढदिवस हा 'खास आपला' असा इतर दिवसांपेक्षा वेगळा दिवस आहे या विचाराने तो हवाहवासा वाटेच!

. . . . . . . . . . . . . . . .(क्रमशः)

Tuesday, July 07, 2009

पडू आजारी - एक स्वानुभव


या घटनांना आता तीन वर्षे होत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे थोडे तटस्थ नजरेने पहाणे शक्य आहे.


शिकलो काव्य "पडू आजारी, मौज हीच वाटे भारी"।
बालपणीच्या पुस्तकांतली गंमत खाशी ती न्यारी।।


दहा जणांचे कुटुंब होते नंदनवन पृथ्वीवरचे।
गोजिरवाणे बालक तेथे कौतुक सर्वांना त्याचे।।
झाली सर्दी तया खोकला तापहि आला बारीकसा।
आजारी वदती ते त्याला सारे देती भरंवसा।।
मऊ भात वर तूप मेतकुट ऊन ऊन देती सांजा।
विश्रांती घेरे बाळा तू आता शाळेला ना जा।।
पाठीवर मायेने फिरती थरथरते हात वडिलधारी।
तयास वाटे पडू आजारी गंमत ही वाटे भारी।।१।।

काळही सरला त्याने नेले ओढुनिया प्रेमळ हांत।
पोटासाठी भटकत फिरते नवी पिढी परदेशांत।।
विस्कटली ती कुटुंबसंस्था विखरुनि गेली सारीजणे।
आपआपुल्या घरट्यामध्ये राहतात चिमणाचिमणे।।
सर्व आधुनिक उपकरणांने नित्य घडे त्यांची सेवा।
संसाराचा सुखी दिखावा इतरांना वाटे हेवा।।
रक्तचाप मधुमेह वगैरे पण व्याधी जडल्या शरीरी।
पडावयाचे नच आजारी उगा व्हायचे कांहीतरी।।२।।


प्रभात ओली चिंब प्रगटली रिमझिम पाऊस लेवूनी।
विचार करतो भ्रमण करावे हातांत छत्री घेऊनी।।
आणि अचानक काय जाहले तया न येई उमजूनी।
डळमळले भूमंडळ सारे सिंधूजळ भासे गगनी।।
गरगर सारे फिरू लागले घरही तयाच्या सभोवरी।
उलट्या होती एकसारख्या अंगी ये ग्लानी भारी।।
दीन अवस्था पाहताक्षणी पत्नी त्याची त्वरा करी।
"अहो किती पडलात आजारी, चला झणी डिस्पेन्सरी"।।३।।


कसेबसे त्याला गाडीने चिकित्सालयाप्रति नेले।

नाडीचे ठोके मोजियले रक्तदाबही तपासले।।

झाले होते स्वैरभैर ते क्षणी घटे तर क्षणि वाढे।

दिधले डाक्टरने इंजेक्शन त्वरित तयाच्या शिरेमध्ये।।

आली निद्रा गाढ म्हणावी कां ग्लानी तेही न कळे।

रक्तचाप नाडी यांचे पण हळूहळू सांधे जुळले।।

होईल सारे सुरळित सांगुन दिले धाडुनी माघारी।

विसंबुनी त्यावर आजारी परतोनी आला स्वघरी।।४।।

सततचि होता वांत्या त्याच्या शरीरातले द्रव घटले।
पुनर्द्रवीकरणाचे चूर्ण सिस्टरने होते दिधले।।
द्रावण करुनी त्याचे त्याने घोटघोट प्राशन केले।
वमनक्रिया अनिवार परंतु सारे उलटे परतवले।।
इस्पितळामध्ये नेऊनी तयास मग एडमिट केले।
सलाईन इंजेक्शनद्वारे औषधोपचार चालविले।।
रात्रभरीच्या त्रासानंतर प्रातःकाली स्थिती बरी।
कशामुळे पडलो आजारी याचा सतत विचार करी।।५।।

वांत्या त्याच्या पु-या थांबता शीशभ्रमण कमी झाले।
नवी समस्या नवेचि प्रकरण त्यात अचानक उद्भवले।।
अठरा तास उलटुनी गेले उत्सर्जन नाही घडले।
घट्ट किवाडे बंद तयांची शरीर व्याकुळ तळमळले।।
नळ्या खुपसुनी करता निचरा पुढला मार्ग सुरू झाला।
दुस-या द्वारी जुनाट शत्रू उग्र रूप धारुन आला।।
मूलाधारसमस्या जागृत झाली जोमाने द्वारी।
असह्य त्याच्या कळा आजारी सहन कशा करणार तरी।।६।।

शल्यविभागामध्ये नेले उपाय सांगितला त्यानी।
रक्तदाब मधुमेह यावरी पूर्ण नियंत्रण घालोनी।।
खात्री पटल्यावर करायचे छोटेसे आपरेशन।
त्या दृष्टीने सुरू जाहले इन्शुलिन इंजेक्शन।।
दोन दिवस झाल्यावर त्यांचे झाले पूर्ण समाधान।
तपासण्यांचे रिपोर्ट आले ते प्रयोगशाळेतून।।
दुस-या कक्षामध्ये निजवले पूर्ण करायासी तयारी।
घटनाचक्राने आजारी गोंधळला पुरता भारी।।७।।

शल्यक्रियेच्या रुग्णांमध्ये त्याची व्याधी अतिक्षुद्र।
आडजागी निजवले तयाला कुणा न चिंता ना कदर।।
आणि अचानक उठला रात्री शिरामध्ये तीव्र शूळ।
चैन उडाली वांत्या झाल्या डळमळले भूमंडळ।।
खूप विव्हळल्यावरती दिधले सलाईन इंजेक्शन।
पूर्वतयारी तरीही करती करावया आपरेशन।।
तळमळला धांवाही करतो कुणी वांचवा धांव हरी।
नच पाडू ऐसा आजारी यातना जया जिव्हारी।।८।।

दुसरे दिवशी येता भार्या तिज सांगितली कर्मकथा।
शल्यक्रिया तहकूब करोनी पुन्हा पाहिली मुख्य व्यथा।।
विचारविनिमय करुन धाडले मज्जातज्ञाचियाकडे।
तपासुनी निष्कर्श काढला हे तर मेंदूचे कोडे।।
एम.आर.आय. चित्रात पाहिले छोट्या मेंदूचे कष्ट।
रक्तवाहिन्यांच्या एम.आर.ए. ने केले चित्र स्पष्ट।।
निदान निश्चित झाले आणिक सुरू औषधे मग दुसरी।
आशेवर राही आजारी मनोमनी पण अधांतरी।।९।।
.
.
.
.
.
.

सरले दुखणे, हळूहळू मग, गाडी आली रुळावरी ।
पडलो होतो आजारी पण , मौज वाटली नच भारी ।।

Friday, July 03, 2009

अवघे गरजे पंढरपूर


आषाढी वारीसाठी गांवोगांवातून निघालेल्या दिंड्या, पालक्या यांच्या मार्गक्रमणाविषयीचे वृत्तांत आणि त्यांची क्षणचित्रे गेले कांही दिवस वर्तमानपत्रात व दूरचित्रवाणीच्या सर्व मराठी वाहिन्यांमधून रोज पहायला मिळत होते. या सोहळ्याचा सर्वोच्च बिंदू आज देवशयनी एकादशीला गांठला गेला. हे सारे वारकरी तर पंढरपूरला पोचलेच, त्याखेरीज रेल्वेगाड्या, बसगाड्या, खाजगी वाहने भरभरून भाविकांनी पंढरपूर गांठले. यासाठी खास गाड्या तर सोटलेल्या होत्याच, पण जेवढी गर्दी डब्यांच्या आंत असेल तेवढीच गाड्यांच्या टपावरदेखील दिसत होती. सुमारे दहा लाखांवर भाविक या यात्रेला आले असावेत असा अंदाज वर्तवला जात आहे.

या सगळ्या लोकांनी काय केले असेल? चंद्रभागेला भरपूर पाणी आलेले आहेच, त्यात डुंबून घेतल्यानंतर जेवढ्या लोकांना जमले असेल तेवढे लोक दर्शनासाठी रांगेत उभे राहिले असतील. बाकीच्या लोकांनी विठ्ठलाच्या नामाचा गजर करून भीमातीर दुमदुमून टाकले असणार. कवी अशोकजी परांजपे यांनी याचे असे सुंदर वर्णन केले आहे.
अवघे गरजे पंढरपूर । चालला नामाचा गजर ।।
टाळघोष कानी येती । ध्यानी विठ्ठलाची मूर्ती ।
पांडुरंगी नाहले हो । चंद्रभागातीर ।।१।।
इडापिडा टळुनी जाती । देहाला वा लाभे मुक्ती।
नामरंगी रंगले हो । संतांचे माहेर ।।२।।
देव दिसे ठाई ठाई । भक्त लीन भक्तापायी ।
सुखालागी आला या हो । आनंदाचा पूर ।।३।।

पंढरीला होणारी ही यात्रा गेली सात आठ शतके इतका काळ दरवर्षी भरत आली आहे. संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या काळातील वारीचे वर्णन करतांना असे म्हंटले आहे.
कुंचे पताका झळकती । टाळ मृदूंग वाजती ।
आनंदे प्रेमे गर्जती । भद्रजाती विठ्ठलाचे ।।
आले हरीचे विनट । वीर वि़ठ्ठलाचे सुभट ।
भेणे झाले दिप्पट । पळती थाट दोषांचे ।।

त्यांचे समकालीन संत नामदेवांनीसुद्धा विठ्ठलाच्या वाऱीकरांचे सविस्तर वर्णन केले आहे. त्यांचे एकमेकांबरोबर वर्तन कशा प्रकारचे असायचे हे संत नामदेवांनी किती छान शब्दांत दाखवले आहे?
एकमेका पुढे लवविती माथे ।
म्हणती आम्हाते लागो ऱज ।।
भक्ति प्रेमभाव भरले ज्यांच्या अंगी ।
नाचति हरिरंगी नेणती लाजु ।।
हर्षे निर्भर चित्तीं आनंदे डोलती ।
हृदयी कृष्णमूर्ती भेटो आली ।।

हे सगळे महात्म्य पंढरीलाच कां आहे याबद्दल नामदेव महाराज सांगतात.
आधी रचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी।।
जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर।।
संत तुकारामांनी म्हंटले आहे.
उदंड पाहिले उदंड ऐकिले। उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे ।
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर। ऐसै विटेवर देव कोठे ।।
ऐसे संतजन ऐसे हरिदास । ऐसा नामघोष सांगा कोठे ।
तुका म्हणे आम्हा अनाथाकारणे । पंढरी निर्माण केली देवे ।।

अशा या अद्वितीय नगरीला जाऊन विठ्ठलाचे भक्त किती आनंदित होतात आणि काय धमाल करतात याबद्दल तुकोबाराय सांगतात.
खेळ मांडियेला वाळवंटी ठाई। नाचती वैष्णव भाई रे।
क्रोध अभिमान केला पावटणी। एक एका लागती पायीं रे।। १।।
नाचती आनंद कल्लोळीं। पवित्र गाणे नामावळी रे।
कळिकाळावरी घातली कास। एक एकाहुनी बळी रे।। २।।
गोपीचंदन तुळशीच्या माळा । हार मिरविती गळा रे ।।
टाळमृदुंगघाई पुष्पवर्षाव । अनुपम सुखसोहळा रे ।।३।।
लुब्धली नादी लागली समाधी। मूढजन नारी लोका रे ।
पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिद्धसाधका रे ।।४।।
वर्ण अभिनाम विसरली जाती । एकएका लोटांगणी जाती रे ।।
निर्मळ चित्ते झाली नवनीते । पाषाणा पाझर सुटती रे ।।५।।
होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे ।।
तुका म्हणे सोपी केली पायवाट । उतरावया भवसागर रे ।।६।।

अशा सोप्या केलेल्या पायवाटेवरून जावे असे वाटून लक्षावधी लोकांनी त्यावरून जाऊन तिचा हमरस्ता केला आणि नामस्मरणाच्या घोषाने पंढरपूरचे वातावरण दुमदुमून गेले.