Wednesday, January 28, 2015

बरॅक ओबामा आणि नरेन्द्र मोदी


२००८ साली अमेरिकेत झालेल्या निवडणूकीच्या काळात मी अमेरिकेत होतो. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निवडणुकीची चक्रे वर्षभर आधी फिरू लागतात. रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटिक या दोन्ही मुख्य पक्षातर्फे ही निवडणूक कुणी लढवायची हे ठरवण्यासाठी प्राथमिक फे-या (प्रायमरीज) सुरू होतात. डेमॉक्रॅटिक पक्षामधल्या काही लोकांची नावे आधी समोर आली,  त्यतले एक नाव 'बरॅक ओबामा' यांचे होते. अमेरिकेचे बरेचसे प्रसिद्ध अध्यक्ष वॉशिंग्टन, जेफरसन, लिंकन, ट्रूमन, क्लिंटन यासारख्या नकारांती आडनावांचे होते, तर रूझवेल्ट आणि बुश यासारखी काही इतर नावेसुद्धा प्रॉपर इंग्रजी वाटत होती. ओबामा हे आडनाव मात्र लुमुंबा, मोबुटू, मोगॅम्बो अशासारखे वेगळे वाटत होते. बरॅक हे त्यांचे नाव तर झोपडी, ओसरी, पागा, गोठा असे कसलेसे वाटत होते. असल्या नावाच्या माणसाला अमेरिकेतले लोक आपला प्रेसिडेंट करतील का याबाबत मला शंकाच होती. नेत्याच्या निवडीचे हे नाटक दोन चार दिवस चालेल आणि संपेल असे मला वाटल्याने मी आधी तिकडे लक्षच दिले नव्हते. पण प्रत्यक्षात मात्र बाकीची सारी नावे वगळली जाऊन अखेर बरॅक ओबामा आणि हिलरी क्लिंटन ही दोन नावे शिल्लक राहिली. त्यातून एक निवडण्यासाठी प्रत्येक राज्यात पक्षांतर्गत डेलेगेट्समधून निवडणूकी घेण्यात आल्या. त्यातून अखेर ओबामांच्या नावाची निवड झाली. या घडामोडींबद्दल वाचतांना ओबामा यांच्याबद्दलचे माझ्या मनातले कुतूहल वाढत गेले. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला अमेरिकेतल्या अंतर्गत राजकारणात इंटरेस्ट वाटायला लागला.

मी अमेरिकेत पोचलो तोपर्यंत तिथे निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली होती. न्यूयॉर्क आणि शिकागोसारख्या महानगरांमध्ये काही ठिकाणी जाहीर सभा होत असत आणि त्याचे वृत्तांत टेलिव्हिजनवर दाखवत होते. त्याखेरीज टी.व्ही.वरील कांही चॅनेल्सवर निवडणुकीनिमित्य सतत कांही ना कार्यक्रम चाललेले असायचे. त्या निवडणुकीतल्या प्रचाराचा सर्वाधिक भर बहुधा टी.व्ही.वरच होता. रिपब्लिकन पक्षातर्फे जॉन मॅकेन यांची उमेदवारी जाहीर झाली होती. ओबामा आणि सिनेटर मॅकेन यांच्या वेगवेगळ्या तसेच अमोरासमोर बसून घेतलेल्या काही मुलाखतीसुध्दा मला पहायला मिळाल्या. जवळजवळ रोजच टेलिव्हिजनवर ओबामांचे दर्शन घडायचे. त्यांचे दिसणे आणि वागणे तर अत्यंत साधेपणाचे होते आणि त्यात किंचितही नाटकीपणा नसायचा. त्यांचे बोलणेही अगदी साध्या सोप्या भाषेत असल्यामुळे माझ्यासारख्या परदेशी माणसालासुद्धा नीट समजत आणि पटत असे. अमेरिकन सामान्य मतदारांना ते नक्की समजत असणार आणि त्यांच्या मनाला जाऊन भिडत असणार. आपल्या भाषणात ओबामा कसलाच आव आणत नसले तरी अमेरिकेच्या सर्व प्रश्नांचा आणि त्यावरील संभाव्य उपायांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केलेला होता आणि विचारलेल्या सर्व प्रश्नाची समर्पक आणि मुद्देसूद उत्तरे ते अगदी सहजपणे देत असत. त्यांच्या नसानसात हजरजबाबीपणा भरलेला होता. त्यांच्या नम्रतेत स्वतःकडे कमीपणा घेणे नव्हते आणि आत्मविश्वासात अहंकार नसायचा. त्यांचे साधे व्यक्तीमत्वच अत्यंत प्रभावशाली होते.

प्रेसिडेंट बुश यांच्या कारकीर्दीत अमेरिका आर्थिक संकटात सापडली असा सर्वसामान्य जनतेचा समज झाला होता. पण त्याचे मोठे भांडवल करण्याचा आणि त्यासाठी बुश यांना दोष देण्याचा मोह ओबामा टाळायचे. "प्राप्त परिस्थितीतून बाहेर येऊन पुन्हा आपले गतवैभव प्राप्त करण्याची अमेरिकन जनतेला गरज आहे आणि आपण सर्वांनी मिळून ते काम करायचे आहे." असे सकारात्मक प्रतिपादन ते करायचे. त्यांच्या बोलण्यात "मी" नसायचे "आपण" असायचे. मॅकेन यांनी मात्र मुख्यतः ओबामांच्या भाषणावर आसूड ओढण्याचेच काम केले. त्यांच्या भाषणातही सारखे ओबामा यांचेच उल्लेख यायचे. ओबामा हे मिश्र वंशाचे आहेत याचा जेवढा गवगवा अमेरिकेतल्या प्रसारमाध्यमांनी त्या काळात केला तेवढाच त्याचा अनुल्लेख ओबामा यांनी स्वतःच्या भाषणात केला. "मी सर्व अमेरिकन जनतेचा प्रतिनिधी आहे." असेच ते नेहमी सांगत आले. त्यांनी विचारपूर्वक घेतलेल्या या धोरणाचा त्यांना चांगला फायदा झाला असणार. एकजात सर्व गौरेतरांचा भरघोस पाठिंबा त्यांना मिळालाच, पण सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे असंतुष्ट असलेले बहुसंख्य गौरवर्णीयही मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूला आल्यामुळे ते प्रचंड बहुमताने निवडून आले.

निवडणूक जिंकल्यानंतर लगेच केलेल्या भाषणाची सुरुवात श्री.ओबामा यांनी या शब्दात केली.
"If there is anyone out there who still doubts that America is a place where all things are possible; who still wonders if the dream of our founders is alive in our time; who still questions the power of our democracy, tonight is your answer."

"अमेरिका ही अशी जागा आहे की जिथे सारे कांही शक्य आहे, याबद्दल जर अजूनही कोणाच्या मनात शंका असेल, आपल्या पूर्वजांची स्वप्ने आजही जीवंत आहेत कां असा विचार कोणाच्या मनात येत असेल, लोकशाहीच्या सामर्थ्याबद्दल कोणाला प्रश्न पडला असेल, तर आज त्यांच्या प्रश्नांना उत्तरे मिळाली आहेत." या शब्दात सिनेटर बरॅक ओबामा यांनी आपल्या विजयाचा स्वीकार केला. खरोखरच ज्या गोष्टीची कल्पनाही दोन वर्षापूर्वी कोणी केली नसती ती शक्य झाली होती आणि त्याचे सर्व श्रेय ओबामा यांनी अमेरिकेच्या जनतेला दिले होते. यात विनयाचा भाग किती आणि कृतज्ञतेची प्रामाणिक भावना किती असा प्रश्न कोणाला पडेल. पण ज्या आत्मविश्वासाने ओबामा यांनी आपली कँपेन चालवली होती त्याबद्दल मला पहिल्या दिवसांपासून त्यांचे कौतुक वाटत होते.

२०१० साली मी काही दिवस गांधीनगरला जाऊन राहिलो होतो. गांधीनगर हे एक प्रेक्षणीय शहर आहे, ते मुख्य म्हणजे तिथल्या सुरेख रस्त्यांमुळे. नव्या मुंबईत पाम बीच रोड नांवाचा एक प्रशस्त आणि सरळ हमरस्ता आहे. तेवढा अपवाद सोडला तर मुंबईतल्या कोठल्याही रस्त्यावरून वाहन चालवणे मेटाकुटीला आणते. गांधीनगरला जिकडे पहावे तिकडे सरळ रेषेत दूरवर जाणारे रुंद रस्ते आहेत. हमरस्ते तर आठ पदरी आहेतच. त्यांच्या बाजूने जाणारे सर्व्हिस रोडदेखील दुपदरी आहेत. आधीपासून असलेल्या रस्त्यांची उत्तम निगा राखली जातेच, शिवाय ज्या भागात अजून वस्तीसुध्दा झालेली नाही अशा संभाव्य विस्ताराच्या प्रदेशात सुद्धा तेंव्हा मोठाले रस्ते बांधले जात होते. रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावलेली होती आणि त्यांचीही व्यवस्थित निगा ठेवलेली होती. आमचे गेस्ट हाऊस शहराच्या बाहेरच्या अंगाला वसवले जात असलेल्या इन्फोसिटी या भागात होते. तिथले रस्ते, नगररचना, इमारती वगैरे पाहता आपण नक्की कोठल्या देशात आहोत असा प्रश्न पडावा. तिथले लोक या सगळ्या विकासाचे श्रेय नरेन्द्र मोदी यांना देत होते.

गांधीनगर शहराच्या चौकाचौकांमध्ये लावलेले भले मोठे फ्लॅक्स तितकेच डोळ्यात भरत होते. नरेंद्र मोदी यांचे निरनिराळ्या मुद्रांमधले मोठमोठे फोटो प्रत्येक फलकावर ठळकपणे रंगवून उरलेल्या जागेत एकादा संदेश, एकादे बोधवाक्य लिहिलेले होते किंवा गुजरात.सरकारची एकादी उपलब्धी किंवा भावी योजना लिहिलेली होती. कुठल्याही मुख्यमंत्र्याला अशा प्रकारे प्रोजेक्ट केले जात असलेले मी यापूर्वी कुठेही पाहिले नव्हते. त्या काळात ते गुजरात राज्याच्या प्रगतीत इतके गुंतलेले दिसत होते की चारच वर्षात ते संपूर्ण देशाचे नेतृत्व करणार असतील अशे मात्र त्या वेळी माझ्या ध्यानीमनीसुद्धा आले नाही.

अमेरिकेतल्या १९०८ मधल्या निवडणुकीत आणि २०१४ साली झालेल्या भारतातल्या लोकसभेच्या निवडणुकीत मला बरेच साम्य दिसले. अमेरिकेत जसा ओबामा यांना आधी त्यांच्या पक्षामधूनच तीव्र विरोध होत होता तसाच भारतात नरेन्द्र मोदी यांनासुद्धा झाला. ओबामांनी अत्यंत शांतपणे आणि मुत्सद्देगिरीने त्या विरोधावर मात केली आणि इतर प्रतिस्पर्ध्यांना बाजूला सारले तसेच मोदींनी केले. शिवाय भारताच्या भावी पंतप्रधानाचे नाव निवडणुकीच्या आधीपासून जाहीरपणे सांगण्याची आवश्यकता नसतांनासुद्धा या वेळेस भारतीय जनता पक्षाने निवडणूक जिंकली तर नरेन्द्र मोदीच पंतप्रधान होतील असे त्यांनी सर्वांकडून वदवून घेतले. बुशच्या राजवटीवर बहुतेक अमेरिकन जनता असंतुष्ट होती, काही प्रमाणात ती चिडलेली होती, त्याचप्रमाणे भारतातली बरीचशी जनता मनमोहनसिंगांच्या सरकारच्या कारभारामुळे वैतागली होती. २०१४ साली भारतीय जनता पक्षाने केलेल्या प्रचारात त्या पक्षाऐवजी नरेंद्र मोदी यांच्या नावावरच अधिक भर दिला गेला. "अबकी बार मोदी सरकार" हा त्यातला मुख्य नारा होता. ओबामा यांच्याप्रमाणेच नरेन्द्र मोदीसुद्धा फर्डे वक्ते आणि अत्यंत संभाषणचतुर आहेत. ओबामांच्या मानाने मॅकेन फिके पडत होते, मोदींच्या विरोधात काँग्रेसचा चेहेरा म्हणून उभे केले गेलेले राहुल गांधी या बाबतीत फारच तोकडे पडत होते. ओबामांनी झंझावाती दौरे करून जास्तीत जास्त अमेरिकन मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर मोहनास्त्र टाकून त्यांना आपल्या बाजूला ओढून घेतले. नरेंद्र मोदींनी तर या अस्त्राचा यशस्वी वापर ओबामांपेक्षाही जास्त प्रभावीपणे केला.

दोन्ही वेळेस झालेल्या निवडणुकांचे निकाल पहाण्याची जबरदस्त उत्सुकता सर्वांच्या मनात होती. निकालाच्या दिवशी सर्वांना त्याबद्दल वाटणारी उत्सुकता अनावर होती. अमेरिकेतल्या निवडणुकींमध्ये ओबामा निवडून येतील असे भविष्य बहुतेक सगळ्या पंडितांनी वर्तवलेले असल्यामुळे त्याची अपेक्षा होतीच, पण त्यांना इतके मोठे मताधिक्य मिळेल असे वाटत नव्हते. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीए (नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स) ही आघाडी सर्वाधिक जागा मिळवेल इतका अंदाज होता, एनडीएला त्याहून जास्त भरघोस यश मिळालेच, पण त्याचा घटक असलेल्या भाजपला स्वतःला बहुमत मिळाले हे त्यांचे यश अपेक्षेच्या पलीकडले होते. या दोन्ही जागी बहुतेक लोकांना हवे वाटणारे निकाल लागले होते. त्यामुळे जल्लोश केला जात होता.

नरेन्द्र मोदी यांना यापूर्वी अमेरिकेने व्हिसा द्यायला नकार दिलेला असल्यामुळे कदाचित त्यांच्या मनात अमेरिकेबद्दल आढी बसलेली असणार असे तर्क केले जात होते. पण आपल्या व्यक्तीगत मानापमानापेक्षा राष्ट्रहिताला जास्त महत्व देणे हे मोदींचे धोरण होते. त्यांनी अमेरिकेशी असलेले संबंध अधिकाधिक दृढ करण्यावर भर दिला. अमेरिकेत जाऊन तिथल्या जनतेशी थेट संवाद साधला आणि प्रेसिडेंट ओबामा यांच्याशी व्यक्तीगत मैत्रीसंबंध प्रस्थापित केले. याची परिणती होऊन हे दोन्ही देश पूर्वी कधीही नव्हते तितके आता जवळ आले आहेत. यंदाच्या २६ जानेवारीला झालेल्या समारंभाचे प्रमुख पाहुणे होण्याचे निमंत्रण ओबामा यांनी स्वीकारले, वेळात वेळ काढून ते आले आणि त्यांनी या छोट्या भेटीत आपली छाप पाडली.

ओबामा आणि मोदी यांच्या संयुक्त पत्रकारपरिशदेमध्ये ओबामांनी केलेले छोटेसे खुसखुशीत भाषणसुद्धा सर्वांना खूप आवडले. इतर मुद्यांशिवाय त्यांनी असे सांगितले की "अमेरिका ही अशी जागा आहे की जिथे सारे कांही शक्य आहे" असे मी म्हणत होतो, आता मी म्हणेन की "भारत ही अशी आणखी एक जागा आहे की जिथे सारे कांही शक्य आहे."  अर्थातच त्यांचा इशारा नरेंद्र मोदी यांच्या गरुडझेपेकडे होता. एका असामान्य राजकारण्याने दुस-याला दिलेली दाद होती.

Friday, January 23, 2015

तेथे कर माझे जुळती - भाग १७ - स्व.भाऊसाहेब भुस्कुटे (उत्तरार्ध)


भाऊसाहेबांनी आपले संपूर्ण जीवन संघकार्याला वाहून घेतले होते. त्यांची कुशाग्र बुद्धीमत्ता, अभ्यासू वृत्ती, कार्यकुशलता, जनसंग्रह, कर्तृत्व आदि गुणांच्या आधारे त्यांना तिथेही पदोन्नति मिळत गेली आणि एक एक पाय-या चढत ते सर्वात वरच्या स्तरापर्यंत जाऊन पोचले होते. ते संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य झाले होते. समाजसेवा, शिक्षण आदि निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या संघपरिवारातल्या अनेक संस्थांशी ते संलग्न झाले होते. त्या संस्थांच्या उपक्रमांचे नियोजन, त्यांच्या कामाची पाहणी करणे, तसेच समित्या, उपसमित्यांच्या बैठका, शिबिरे, समारंभ यांना उपस्थित राहून मार्गदर्शन करणे वगैरें कामांसाठी त्यांना नेहमी दौ-यावर जावे लागत असे आणि त्यामुळे बराचसा काळ ते बाहेरगावी गेलेले असत. जेंव्हा ते घरी असत तेंव्हाही त्यांना भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांची रीघ लागलेली असायची. काही कार्यकर्ते किंवा पदाधिकारी मुक्कामाला थांबत असत तेंव्हा त्यांच्या जेवणखाण्याची आणि राहण्याची व्यवस्था वाड्यावरच होत असे.

भाऊसाहेबांच्या वाड्यातल्या एका सोप्यात ओळीने खुर्च्या आणि सोफे मांडून दहा बारा लोकांच्या बसण्याची व्यवस्था केलेली होती. त्यांच्याकडचे पाहुणे आणि त्यांना भेटायला आलेली मंडळी तिथे बसून वर्तमानपत्रे चाळवीत किंवा चहाचे घोट घेत गप्पागोष्टी करत बसत. भाऊसाहेबांना त्यांच्या कामाच्या व्यापातून थोडा निवांत वेळ मिळाला की त्या सोप्याच्या एका बाजूला टांगलेल्या झोपाळ्यावर ते येऊन बसत, समोर बसलेल्या व्यक्तींची आपुलकीने विचारपूस करत असत आणि त्यांच्या गप्पांमध्ये सामील होत असत. तो एक प्रकारचा छोटासा दरबारच असायचा. त्यात अनेक विषयांवर गप्पागोष्टी, संभाषण, चर्चा वगैरे चाललेल्या असायच्या. काही कारणानुळे मी त्यांच्या समोरून जात असलो तर ते मलाही हाक मारून बोलवायचे आणि समोर बसायला सांगायचे. आपल्यालाही ज्ञानामृताचे काही कण मिळतील म्हणून मी तत्परतेने तिथे बसून घेत असे.

या संभाषणांमधून मला निरनिराळ्या लोकांचे निरनिराळे अनुभव ऐकायला मिळत होते, कोणत्या प्रसंगी कसे वागावे किंवा वागू नये आणि प्रत्यक्षात लोक कसे वागतात वगैरे ऐकणे मला खूप इंटरेस्टिंग वाटत असे. मला आधी ठाऊक नसलेल्या काही बातम्या त्या ठिकाणी समजत होत्याच, शिवाय काही घटनांना प्रसारमाध्यमांमध्ये कशी प्रसिद्धी मिळते आणि वास्तविक कशी वेगळी परिस्थिती असते हे ऐकायला मिळत असे. एकच घटना वेगवेगळ्या अँगल्समधून पाहता ती कशी वेगळी दिसते हे त्यातून समजत होते. त्या मैफलींमधले बहुतेक संभाषण तात्कालिक घडामोडींविषयी होत असले तरी त्या संदर्भात काही इतिहासकालीन किंवा पुराणातले दाखले ऐकायला मिळत. आपला अभिप्राय व्यक्त करतांना भाऊसाहेब गीतेमधले श्लोक किंवा संस्कृत सुभाषिते वगैरे अधून मधून सांगत असत. माझ्या दृष्टीने तो अनुभव एकंदरीत चांगला असायचा पण तो जरा एकांगी आहे, त्यात दुस-या बाजूचा पुरेसा विचार केला जात नाही असे मात्र मला कधी कधी वाटायचे एवढेच

आयुर्विमा, बँका, रेल्वे आदींच्या काँप्यूटरायझेशनला सुरुवात झाली त्या काळात बहुतेक सगळ्या विरोधी पक्षांनी त्याला तीव्र विरोध केला होता. त्याबद्दलच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये येत असत. त्या काळात सर्वसामान्य लोकांना या विषयाची फारशी जाण नव्हती. एकदा मी भाऊसाहेबांच्या दरबारात बसलेलो असतांना "ये काँप्यूटर क्या होता है?" असे कुणीतरी कुतूहल म्हणून विचारले. एकाद्या अनभिज्ञ माणसाला ते समजावून सांगण्यासाठी कुठून सुरुवात करावी याचा मी विचार करत होतो. पण भाऊसाहेबांनी आपल्या इंग्रजी भाषेच्या ज्ञानामधून असा तर्क केला असावा की काँप्यूट म्हणजे कॅल्क्युलेट तसेच काँप्यूटर म्हणजे कॅल्क्युलेटर असेल आणि त्यांनी तो अर्थ सांगूनही टाकला. अत्यंत गुंतागुंतीची आणि प्रचंड आकडेमोड सुद्धा काँप्यूटरद्वारे चुटकीसरशी करता येते. या अर्थाने हे उत्तरही बरोबरच असले तरी हा त्याचा फक्त एक उपयोग आहे. काँप्यूटरच्या सहाय्याने त्याखेरीज इतर अनेक कामे सुलभपणे करता येत असल्यामुळे "काँप्यूटर म्हणजे फक्त एक मोठा कॅल्क्युलेटर" असे म्हणता येणार नाही. एकादा माणूस कितीही मोठा विद्वान असला तरी तो सर्वज्ञ होऊ शकत नाही, पण त्याच्याकडून लोकांची तशी अपेक्षा असली तर त्यामुळे कधीकधी असे प्रसंग घडू शकतात.

"हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारता जो घणी।। तोच मोल पावे खरा, करणीचा होय चुरा।।" असे संत तुकाराम महाराजांनी संतांबद्दल म्हंटले आहे. असामान्य माणूस सर्वसामान्यांपेक्षा कसा वेगळा असतो हे कठीण प्रसंगीच कळते. भाऊसाहेब असेच असामान्य पुरुष होते. आणीबाणीच्या काळात त्यांना बंदीवासात ठेवले गेले होते. त्याच काळात त्यांच्या मुलीचे लग्न ठरले. आम्ही त्या समारंभासाठी नागपूरला गेलो होतो. या कारणासाठी तरी त्यांना नक्कीच मुक्त केले जाईल असे आम्हाला वाटत होते, पण लग्नाच्या व-हाडासोबत ते आलेले नव्हतेच, लग्नाच्या आदले दिवशी संध्याकाळपर्यंत कार्यस्थळी येऊन पोचले नव्हते. जेलच्या नियमांनुसार त्यांना सोडण्यासाठी त्यांनी काही कागदांवर सह्या करणे आवश्यक असावे. सुटकेसाठी अर्ज, विनंती, पुन्हा परत येण्याची हमी वगैरे त्यांच्याकडून मागितले गेले असणार, पण असे समजले की त्यांनी याला सपशेल नकार दिला होता. आपली काहीच चूक नसतांना ज्या लोकांनी आपल्याला (अन्यायाने) डांबून ठेवले होते, त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन त्यांची मनधरणी करणे भाऊसाहेबांना अजीबात मान्य नव्हते असे समजले. त्यांच्याबद्दल असलेला आदर शतपटीने वाढला, पण या मंगल प्रसंगी त्यांची उपस्थिती नसल्यामुळे वाईटही वाटत होते. जड अंतःकरणाने सगळे धार्मिक विधी पार पाडले जात असले तरी कोणाला त्यात उत्साह वाटत नव्हता. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर "भाऊसाहेब आले." असा अचानक गलबला झाला आणि सगळे पाहुणे जागे होऊन हॉलमध्ये आले. खरोखरच भाऊसाहेब प्रवेश करत होते. कदाचित त्यांच्या नावाचा इतका दबदबा होता की त्यांच्या स्वाभिमानाला धक्का न लावता त्यांना तिथे आणून पोचवण्याची व्यवस्था झाली होती. त्यांना प्रवासाचा थकवा आलेला दिसत असला तरी नेहमीसारख्याच शांत मुद्रेने आत येऊन त्यांनी सगळ्या पाहुण्यांना प्रेमाने अभिवादन केले, हंसतमुखाने सर्वांचे स्वागत केले. क्षणार्धात सगळे वातावरण चैतन्याने भारले गेले

तो लग्नसमारंभ संपेपर्यंत ते त्यात सहभागी होत राहिले. त्या दिवसभरात त्यांनी कोणावरही कसल्याही प्रकारचा राग किंवा द्वेष व्यक्त केला नाही, तसलेही दुःख सांगितले नाही की कोणाही विरुद्ध तक्रारीचा सूर काढला नाही. तुरुंगवास भोगत असतांनासुद्धा जणू काही घडलेच नाही असे ते भासवत राहिले. इतका संयम, एवढे मनोबल एकादा योगीच बाळगू शकत असेल. भाऊसाहेब निश्चितपणे एक कर्मयोगी होते. त्यांनी "हिंदू धर्म, मानवधर्म" या नावाचे एक पुस्तक लिहून त्यात हिंदू धर्माबद्दलचे त्यांचे विचार मांडले होते. त्यातली मुख्य तत्वे त्यांनी स्वतः आचरणात आणली होती.

मला भेटलेल्या आणि वंदनीय वाटलेल्या व्यक्तींबद्दल या स्थळावर चार शब्द लिहिण्याचे काम मी गेली काही वर्षे करत आलो आहे. एकाद्या व्यक्तीचे चरित्र लिहिण्याचा हा प्रयत्न नाही, त्या व्यक्तीसंबंधीच्या माझ्या काही व्यक्तीगत आठवणी मी यात नमूद करत आलो आहे. या मालिकेतले एक पुष्प श्रद्धेय श्री भाऊसाहेबांच्या चरणी वाहण्याची संधी मी त्यांच्या शतसांवत्सरिक वर्षाच्या निमित्यांने घेत आहे. . 



Sunday, January 18, 2015

तेथे कर माझे जुळती - भाग १७ - स्व.भाऊसाहेब भुस्कुटे (पूर्वार्ध)



माझे लग्न ठरल्यानंतर मी एक लहानसा फ्लॅट भाड्याने घेतला. तिथे स्थिरस्थावर व्हायच्या आधीच मला एक निरोप आला की अलकाचे म्हणजे माझ्या भावी वधूचे भाऊसाहेबकाका मला भेटायला (आणि माझे घर पाहायला) अमक्या दिवशी संध्याकाळी येणार आहेत. पण तोंवर मी फक्त झोपण्यासाठी एक पलंग आणि चहा करण्यापुरती दोन चार जुजबी भांडी घरात आणून ठेवली होती. त्यांच्या व्यतिरिक्त माझ्या घरात (पहायला असे) काहीच नव्हते. फक्त भेटायचे असते तर ते जिथे आले असतील तिथे जाऊन मीच त्यांना भेटून आलो असतो, पण त्यांना माझे घर पहायचे होते.

ठरल्या वेळी एका प्रचारकाला बरोबर घेऊन ते माझ्या घरी येऊन पोचले. त्यांची उंच आणि सुदृढ शरीरयष्टी, गोरापान आणि तेजःपुंज चेहेरा, त्यावर अत्यंत सात्विक भाव वगैरे पाहून मी क्षणभर त्यांचेकडे पहात राहिलो. भानावर येताक्षणी लगेच त्यांना वाकून नमस्कार केला तो फक्त औपचारिक नव्हता. माझ्याहून सर्वतोपरीने खूप मोठ्या अशा व्यक्तिमत्वाबद्दल मनात दाटून आलेला आदरभाव त्यात होता. माझे काडेपेटीएवढे आणि तेसुद्धा ओकेबोके असे घरकुल पाहून त्यांना काय वाटले असेल कोण जाणे, पण त्यांनी ते बोलून दाखवले नाही. अत्यंत आपुलकीने त्यांनी माझी थोडी विचारपूस केली आणि इकडच्या तिकडच्या काही गोष्टी झाल्या. माझे कौतुक करण्यासारखे माझ्याकडे काही नव्हतेच, माझ्याबद्दल त्यांचे कितपत अनुकूल मत झाले होते तेही मला कळले नाही. पण ठरल्याप्रमाणे आमचे लग्न झाले आणि भाऊसाहेबकाकांचा आम्हाला आशीर्वाद मिळाला यात सगळे आले. 

लग्न झाल्यानंतर मी अनेक वेळा सासुरवाडीला गेलो. मध्यप्रदेशातल्या टिमरनी नावाच्या गावी भुस्कुट्यांची पुरातनकाळातली गढी आहे. पेशवाईच्या काळात शिंदे होळकर आदि मराठे सरदार उत्तरदिग्विजयासाठी निघाले तेंव्हा त्यांच्यासमवेत भुस्कुट्यांचे पूर्वज या भागात जाऊन स्थाइक झाले होते. आपल्या संरक्षणासाठी त्यांनी ही गढी बांधली असेल किंवा काबीज करून आपल्या ताब्यात घेतली असेल. तेंव्हापासून ती या कुटुंबाकडे आहे. त्या भागात लहानशा भुईकोट किल्ल्याला गढी म्हणतात. शनिवारवाड्याप्रमाणे त्याच्या सगळ्या बाजूंनी तटबंदी आहे, त्यात मध्ये मध्ये बुरुज आहेत आणि आत जाण्यासाठी एक अवाढव्य आकाराचा दरवाजा आहे.

गढीच्या आत एक जुन्या काळातला प्रचंड मोठा वाडा आहे तसेच आणखी काही वास्तू आहेत. माझे लग्न झाले त्या वेळी भाऊसाहेब, बाबासाहेब आणि अण्णासाहेब यांची अशी तीन कुटुंबे त्यात रहात असत. त्यांच्यात कागदोपत्री वाटण्या झाल्या होत्या आणि तीन ठिकाणी वेगळ्या चुली मांडल्या गेल्या होत्या असे असले तरी मनाने ते सगळे कुटुंबीय एकमेकांशी घट्ट बांधलेले होते. काही तरी विचारायला किंवा सांगायला, मागायला किंवा द्यायला, नाहीतर अशाच नुसत्या गप्पा मारायला म्हणून रोजच बहुतेक सगळ्यांचे आपसात एकमेकांकडे जाणेयेणे चाललेले असे. गढीतली लहान मुले कुठेही एकत्र खेळत, कुणाकडेही खातपीत आणि कधीकधी झोपून पण जात असत. त्यांच्या दृष्टीने सगळे मिळून एकच कुटुंब होते, त्यांच्यात सख्खा, चुलत वगैरे भेदभाव नसायचा.

आपले भाऊसाहेब अशा त्या अद्भुत कुटुंबाचे प्रमुख होते आणि त्या सर्वांना एकत्र बांधून ठेवणारे सूत्रधार होते असेही कदाचित म्हणता येईल. त्यांच्या नावाचाच मोठा दरारा होता. निरनिराळ्या विषयांवरील आपापसातल्या बोलण्यातल्या संभाषणाची गाडी एका विशिष्ट वळणावर अनेक वेळा येत असे. "यावर भाऊसाहेब काय म्हणतील? त्यांना काय आवडेल? त्यांना हे पटेल किंवा चालेल का?" वगैरे वगैरे... . त्यापुढची चर्चा "त्या वेळी ते असे बोलले होते किंवा आणखी कधी त्यांनी तसे सांगितले होते किंवा तसे केले होते." अशा पद्धतीने चालत असे. आपली मते मांडतांना सुद्धा अशा प्रकारचा त्यांचा आधार घेतला जात असे.

माझ्या लहानपणी आमच्या वडिलांचासुद्धा घरातल्या सर्वांना प्रचंड धाक वाटत असे. त्यांच्या विरोधात ब्र उच्चारण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती, चुकून काही तरी विसंवादी शब्द तोंडातून निघतील या भीतीमुळे त्यांच्यासमोर असतांना सहसा कोणीही मोकळेपणे बोलत नसत, कधी कधी तर त्यांच्या समोर यायचेच टाळत असत. अशा प्रकारच्या वातावरणाचा मला अनुभव होता आणि त्यात माझी तिथे घुसमट होत होती, पण इथे मी त्रयस्थपणे पाहू शकत होतो. त्यावर विचार करू शकत होतो. माझे वडील शीघ्रकोपी असल्यामुळे त्यांचा राग अनावर होत असे याची सर्वांना धास्ती वाटायची. पण भाऊसाहेब मला तरी खूप शांत, प्रेमळ आणि सात्विक वृत्तीचे दिसत होते, त्यांच्या बोलण्यात मार्दव होते. तरीही सर्वांना त्यांची भीती का वाटावी हा प्रश्न मला पडत असे. 

कदाचित असे असेल की त्यांची बुद्धीमत्ता आणि विद्वत्ता सर्वसामान्यांहून खूप उच्च दर्जाची होतीच, त्यांचा जनसंपर्क दांडगा होता आणि अनुभवविश्व अचाट होते. याचा सर्वांवर प्रभाव पडत असणार. "केल्याने देशाटन, पंडितमैत्री सभेत संचार। शास्त्रग्रंथविवेचन मनुजा चातुर्य येतसे फार।।" असे एक सुभाषित आहे. मूळच्याच कुशाग्र बुद्धीला या सर्वांची साथ मिळाली तर तिचा अफाट विकास होणार आणि भाऊसाहेबांच्या बाबतीत या चारही गोष्टी मुबलक प्रमाणात घडत असत. यामुळे सर्वांच्या मनात त्यांच्याविषयी इतका आदरभाव निर्माण झाला होता की त्यांनी मार्गदर्शन करावे आणि आपण मुकाटपणे त्या रस्त्याने जावे असे इतराना नेहमीच वाटत असणार. त्यापेक्षा वेगळे काही केले तर त्यावर "भाऊसाहेब काय म्हणतील?" यापेक्षा सुद्धा "यात आपलीच काही चूक होत आहे का?" अशी शंका येत असेल किंवा "बाकीचे लोक असे समजतील का?" असा प्रश्नही पडत असेल. त्यापेक्षा कुठलेही काम भाऊसाहेबांना विचारून काहीही केलेले सर्वांना सुरक्षित वाटत असावे.

. .  . . . . . . .  . . . . . . . . . . .  (क्रमशः)