Friday, May 24, 2013

संस्मरणीय समारंभ - २ (उत्तरार्ध)


या कार्याला 'उपस्थित' राहून त्याची 'शोभा' वाढवण्यासाठी भरपूर पाहुणे मंडळी आली होती. बटूंची आई आणि वडील या दोघांच्या बाजूचे नातेवाईक होते, त्यात पुन्हा वडिलांच्या आईच्या बाजूचे मामा, मावश्या वगैरे आणि वडिलांच्या बाजूचे काका, आत्या वगैरे आणि त्यांची मुले तसेच आईच्या दोन्ही बाजूचे आप्त असे चार मुख्य गट होते. वेगवेगळ्या गटात असलेले त्यातले काही लोक एकाच गावात रहात असल्यामुळे, नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्याने, पूर्वी भेटलेले असल्यामुळे किंवा इतर काही कारणाने आधीपासून एकमेकांना ओळखत होते, तर काही जण उत्साहाने नव्या ओळखी करून घेत होते. पण बहुसंख्य लोक आपापल्या लहान लहान ग्रुपमध्येच वावरतांना दिसत होते आणि ते साहजीकच आहे. अनेक जवळचे नातेवाईकसुध्दा दूर रहात असल्यामुळे कालांतरानेच प्रत्यक्ष भेटतात, तेंव्हा त्यांच्या सहवासात वेळ घालवावा असेच कोणालाही वाटेल. पुण्यामुंबईला रहात असलेले माझेच कितीतरी आप्तजन अशा निमित्यानेच मला कुठल्याशा तिस-याच जागी भेटतात. प्रत्येक वेळा "आता आमच्या घरी यायचं हां, म्हणजे खूप गप्पा मारता येतील." अशी एकमेकांना आमंत्रणे दिली जातात आणि "नक्की येऊ." अशी आश्वासने दिली जातात, पण ती कधीच पाळली जात नाहीत असा अनुभव येतो. त्यामुळे जेंव्हा सहवासाचे चार क्षण मिळतात त्यांचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा असे वाटणारच.

मुंजीच्या आदले दिवशी बरेचसे नातेवाईक जमलेले असल्यामुळे आहेराचा कार्यक्रम त्या दिवशी करून घेतला गेला. त्या रात्री जेवणे झाल्यानंतर सर्वांना मांडवात बोलावण्यात आले. त्यात आधी एक छोटासा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर सर्व पाहुण्यांच्या ओळखी करून दिल्या घेतल्या जातील असे सांगितले गेले होते. बरीचशी मंडळी जमल्यानंतर एका भाषणाच्या वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यजमान कुटुंबातल्या सर्वात ज्येष्ठ व्यक्तींबद्दल अपार आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करून झाल्यानंतर त्यांच्या मुलाने त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वाने कशी आणि केवढी मोठी प्रगती केली याचे मानपत्र वाचून झाले. याच आशयाचे आणखी एक भाषण आणि कवितावाचन झाले. हे सगळे ऐकतांना काही जण भावनावश किंवा सद्गदित झाले, काही लोकांना खूप अभिमान किंवा कौतुक वाटले. "अशी माणसं सहसा कुठे पहायला मिळतात? आपण किती सुदैवी आहोत?" असे भाव त्यांच्या चेहे-यांवर उमटत होते. काही जणांच्या कपाळावर सूक्ष्म आठ्या पडत होत्या, काही हळूच नाक मुरडत होते तर काही चेहे-यावर छद्मी हास्य उमटत होते. "अशी कितीतरी माणसं आम्ही पाहिली आहेत. आम्ही पण या सगळ्यामधूनच वर आलो आहोत ना? अंदरकूी बात आम्हाला माहीत आहे हो!" अशा प्रकारची वाक्ये बहुधा त्यांच्या मनात उठत असावीत असे त्यांच्या मुद्रांवरून वाटत होते. कुणाबद्दलही चांगले बोललेलेसुध्दा सर्वच लोक सहन करू शकतात असे नाही असा मनुष्यस्वभावच आहे.

त्यानंतर गाणी म्हणण्याला सुरुवात झाली आणि एकमेकांना आग्रह होऊ लागले, विशिष्ट गाण्यांच्या फर्माइशी होऊ लागल्या. ही अभिभाषणे आणि गायन वगैरे होत असतांना मायक्रोफोन वारंवार बिघडत होता. त्यामुळे बोलण्याची किंवा गाण्यातली लय सारखी तुटत होती. कदाचित माइक उपलब्ध होत नसल्यामुळे असेल, पण ओळखपरेड करण्याचे त्यानंतर कुणीच मनावर घेतले नाही. तेवढ्यातच 'परत आहेरा'ची पाकिटे आणि लाडूचिवड्याचे पॅकेट्स वाटायला सुरुवात झाली. त्या निमित्याने एकेका कुटुंबाला बोलावले असतांनाच त्यांची ओळख करून देणे शक्य झाले असते, पण घरातल्या मुख्य लोकांना हा कार्यक्रम शक्य तितक्या लवकर आटोपून दुस-या दिवशीच्या तयारीलाही लागायचे होते. जमलेल्या लोकांना जागेवर बसवून ठेवण्यासाठी काही जणांनी जुन्या आठवणी सांगणे सुरू केले. त्यात काही जणांनी खरोखर मजेदार किस्से सांगितले, काही जणांनी जे काही सांगितले ते थोड्या लोकांना मजेदार वाटले, उरलेल्यांना त्याचा संदर्भ लागला नाही. जमलेले लोकही हळूहळू पांगायला लागले. बरेच जण झोपायला गेले, काही लोक कामाला लागले, काही लोक मात्र मध्यरात्र उलटून गेली तरी भूतकाळाच्या आठवणींमध्ये रमून मांडवातच गप्पा मारत बसले होते. 

दुसरे दिवशी सकाळी मुंजींचे मुहूर्त होते. दोन सख्ख्या भावांचे व्रतबंध होणार असले तरी ते निरनिराळ्या मुहूर्तांवर करायचे होते. दोन मुहूर्तांमध्ये फक्त दहा पंधरा मिनिटांचे अंतर होते. एका मुलाची मुंज अर्थातच त्याचे पिताश्री लावणार होते आणि एक ज्येष्ठ आप्त दुस-या मुलाला गायत्रीमंत्राची दीक्षा देणार होते. दोन कार्यांसाठी दोन हवनकुंडे मांडली होती. मुहूर्ताच्या तासभर आधी आलेल्या एका पोक्त महिलेने आयत्या वेळी गरज पडली तर उपयोगी पडेल म्हणून येतांना एका मंगलाष्टकाची प्रत आणली होती. ती नेमकी कोणत्या कवीने कोणासाठी रचली होती याचा त्यात उल्लेख नव्हता आणि त्यांनाही ते आठवत नव्हते. असे असले तरी ती कोणासाठीही चालू शकतील अशी होती. मंगलाष्टकांबद्दल मला आधीच सांगितले गेले असल्याप्रमाणे मीही थोडी जुळवाजुळव करून नेली होती. दोन निरनिराळ्या मुंजी असल्यामुळे दोन्हींचा उपयोग झाला.

लग्नाच्या वेळी रुखवत मांडायची पध्दत आहे, तशी मुंजीच्या बाबतीत आहे की नाही हे मला ठाऊक नाही. निदान लक्षात राहण्यासारखे रुखवत मी पाहिले नव्हते. या वेळी मात्र अगदी अप्रतिम अशी दोन दृष्ये एका टेबलावर मांडून ठेवली होती. खाली अक्रोड आणि त्याच्यावर सुपारी आणि दोन दोन काजू चिकटवून आणि त्यांना नाक, कान, डोळे चिकटवून किंवा रंगवून अनेक सुबक बटू तयार केले होते. एका बाजूला लहान लहान पर्णकुट्या, आजूबाजूला छोटेसे वृक्ष, बागा, झाडाखाली बसलेले तपस्वी आणि त्यांच्या समोर बसून शिक्षण घेणारे बटू, वगैरेंमधून अप्रतिम असे गुरुकुल तयार केले होते. दुस-या दृष्यात अनेक बटूंना रांगेत बसवून आणि त्यांच्यासमोर इवलीशी पाने मांडून भोजनाची पंगत केली होती. 

या कार्यासाठी परगावाहून आलेल्या पाहुण्यांची बरीच संख्या होतीच, स्थानिक लोकांनी मुहूर्ताच्या वेळेला खूप गर्दी करून संपूर्ण मांडव व्यापून टाकला. त्यानंतर झालेल्या 'प्रीतीभोजा'ला निदान सात आठशे तरी माणसे जेवून गेली असावीत. पण केटररने त्यांची अगदी चोख व्यवस्था ठेवली होती. सर्वांना पुरतील एवढ्या मेलमावेअरच्या थाळ्या आणि वाडग्यांचे ढीग लावून ठेवले होते. पाणी पिण्याचे प्लॅस्टिकचे छोटे डिस्पोजेबल ग्लास तर हजारोंच्या संख्येने आणले असतील. फिल्टर केलेल्या पाण्याचे निदान शंभर तरी सीलबंद मोठे बुधले मागवले असतील. भर उन्हाळ्यात सारखी तहान लागत असते, गळ्याला शोष पडत असतो. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे लागते. सध्याच्या पाणीटंचाईच्या या दिवसात, त्यातही एका लहानशा गावात कसले आणि किती पाणी प्यायला मिळणार आहे अशी शंका अनेकांच्या मनात होती. पण हे लक्षात घेऊन स्वच्छ आणि निर्जंतुक केलेल्या मुबलक पाण्याची व्यवस्था त्यांनी केली होती, यापेक्षाही महत्वाचे म्हणजे ते इतकी व्यवस्था करू शकले होते.

जेवणाची पंगत हा प्रकार आता लहान गावांमधूनसुध्दा कमी झाला आहे. मुंजीच्या आदल्या दिवशी फक्त घरातली पाहुणे मंडळी असल्यामुळे टेबलावरल्या पंगतीची मेजवानी झाली होती. अर्थातच त्यात एक वेगळी मजा आली होती. मुंजीच्या दिवशी झालेली गावामधील लोकांची गर्दी पाहता ते शक्य नव्हते. पूर्वीच्या काळात पंगतीमध्ये प्रत्येकाच्या ताटात पक्वान्ने वाढण्याचा आग्रह करणे, खाणा-यांनी संकोच करणे, त्यात घासाघीस, चढाओढ वगैरेंमुळे एकेक पंगत जेवून उठायला खूप वेळ लागत असे. एक पंगत जेवून उठेपर्यंत इतर लोकांना ताटकळत बसावे लागत असे. दुपारच्या जेवणाची शेवटची पंगत बसायलाच संध्याकाळचे चार पाच वाजलेले मी अनुभवले आहे. बूफे पध्दतीत हा वेळ वाचत असल्यामुळे सर्वांना वेळेवर जेवण मिळू शकते आणि आजकाल सगळीकडेच बूफे सिस्टम रूढ झाली आहे. त्याला रुचिभोज असे गोंडस नावही दिले जाते. या समारंभातल्या केटररने जेवणाचे तीन चार काउंटर मांडलेले असल्यामुळे ते घेण्यासाठी फारशा लांब रांगा लागत नव्हत्या. 

रात्र पडल्यानंतर 'भिक्षावळ' नावाची जंगी मिरवणूक निघाली. बटूंना बसण्यासाठी खूप सजवलेली एक घोड्याची बगी आणली होतीच, शिवाय नाचणारे दोन घोडे आणले होते. वाजंत्री, दिवे धरणारे वगैरे लोक होतेच. मध्यंतरीच्या काळात तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीचा भरपूर फायदा या मिरवणुकीत उचललेला दिसला. पूर्वीच्या काळात डोक्यावर पेट्रोमॅक्सचे दिवे घेतलेले लोक वरातीच्या बाजूने चालत असत. या वेळी वरातीच्या मागून जाणा-या एका व्हॅनमध्ये एक जनरेटर ठेवला होता आणि माणसांनी डोक्यावर धरलेले विजेचे दिवे त्याला फ्लेक्सिबल केबल्सनी जोडले होते. वरातीच्या पुढे एका सजवलेल्या व्हॅनमध्ये डीजे बसला होता आणि डीव्हीडी प्लेयर, अँप्लिपायर, स्पीकर वगैरे ठेवले होते, शिवाय बँडवालेही होतेच. मिरवणूक चालत असतांना थोड्या थोड्या अंतरावर थांबून काही जागी ती घोड्याची जोडी नाचत होती आणि बहुतेक ठिकाणी वरातीतली मुले, मुली आणि माणसे नाचून घेत होती. याच गावामध्ये सतरा अठरा वर्षांपूर्वी झालेल्या मुंजीमधल्या मिरवणुकीत थोडीच मुले काहीशी बिचकत नाचली होती, या वेळी मात्र लहान मोठे सगळेच जण फुलटू धमाल करून घेत होते. गावातली काही पोरे मोहरमच्या वाघासारखे हातवारे करतांना पाहून मात्र हसायला आले. उडवायच्या दारूच्या आतिशबाजीत तर कल्पनातीत प्रगती झाली आहे. विविध प्रकारचे फटाके, चक्रे, कारंजे, आकाशबाण वगैरे नेत्रदीपक रोषणाई आपण दिवाळीच्या दिवसात पाहतोच. या मिरवणुकीत त्यांचा उपयोग जरा जास्तच सढळपणाने केला जात होता. उंच बांबूच्या किंवा पाइपाच्या वरच्या टोकाला एक फ्रेम बांधून त्यावर अनेक प्रकारची चक्रे आणि प्रकाशझोत टाकणारे आयटम बसवले होते. ते सारे एकसाथ पेटवून दिल्यावर त्यामधून मनोरम चित्रे निर्माण होत होती. आतिशबाजीमधले खूप वैविध्य या मिरवणुकीत पहायला मिळाले. हे सगळे ग्रामीण भागात घडत होते याचे नवल होते.  

एकंदरीत पाहता हा समारंभ खूपच थाटामाटात झाला, माझ्या अनुभवविश्वातल्या उपनयन समारंभांचा यापूर्वीचा उच्चांक त्याने मोडला आणि नवा उच्चांक स्थापन केला. त्या लहानशा गावातल्या लोकांनाही एक 'यादगार आणि शानदार' असा 'जनेऊ समारोह' पहायला मिळाला.
  . . . . .  . . . . . . . . .  . . (समाप्त)

Thursday, May 23, 2013

संस्मरणीय समारंभ (पूर्वार्ध)



मध्यप्रदेशातल्या एका लहानशा गावावर निसर्गाची कृपा आहे. सुपीक जमीन, पुरेसा पाणीपुरवठा आणि शेतीला अनुकूल असे हवामान तिथे वर्षभर असते. तिथे राहणा-या कष्टाळू आणि उद्योगशील लोकांनी त्यांच्या अथक प्रयत्नाने तो भाग समृध्द बनवला आहे. गेल्या काही दशकातल्या कृषीक्रांतीने त्या भागात बरीच सुबत्ता आणली आहे. तिथल्या एका प्रतिष्ठित परिवारामधल्या एका मुलाच्या व्रतबंधाच्या सोहळ्याला मी सतरा अठरा वर्षांपूर्वी गेलो होतो. आपल्याकडे विवाहसमारंभांचा जोरदार धूमधडाका वाढत चाललेला आहे आणि त्याचा व्याप आभाळाला जाऊन भिडला आहे हे आपण पहातोच. पण आजच्या काळात मौंजीबंधनाला फारसा धार्मिक अर्थ उरलेला नसल्यामुळे ते कालबाह्य होत चालले आहे असे मला वाटत होते. या पार्श्वभूमीवर पाहता मी त्या वेळी पाहिलेला समारंभ निव्वळ अपूर्व होता. अशा प्रकारे इतक्या थाटामाटाने केलेला मुंजीचा सोहळा मी तरी त्यापूर्वी कधी पाहिला नव्हता. त्यानंतर दहा बारा वर्षांनी म्हणजे पाच वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातल्याच दुस-या भागातल्या एका लहान गावातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलांच्या उपनयनाचा कार्यक्रम पाहिला. त्यांच्या परिस्थितीच्या मानाने पाहता त्यांनीसुध्दा चांगलाच थाट केला होता. या सोहळ्याचा वृत्तांत मी मौंजीबंधन या मथळ्याखाली पाच भागांमध्ये या ब्लॉगवर  दिला होता.

असा दिमाखदार सोहळा महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरात किंवा गावात पहाण्याचा मात्र एकही योग गेल्या पन्नास वर्षात माझ्या नशीबात आला नाही. पण ही प्रथा आता बहुधा नाहीशी होणार असेच वाटत असतांना गेल्या दहा वर्षात मला अनेक व्रतबंध समारंभ पहायला मिळाले. यातल्या बहुतेक मुलांचे आईवडील इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत, काही जण परदेशात जाऊन तिकडे राहून आले आहेत, त्यातल्या काही जणांनी आंतरजातीय प्रेमविवाह केले आहेत, काही माता एरवी नेहमी जीन पँटमध्ये वावरत असतात. या लोकांनी आपल्या मुलांच्या साग्रसंगीत मुंजी लावाव्यात हे मला अपेक्षित नव्हते, पण प्रत्यक्षात ते समारंभ साजरे केले गेले. त्यांचे स्वरूप मात्र बरेच वेगळे होते. मुंबई, पुणे आणि नागपूर यासारख्या महानगरांमधल्या एकाद्या चांगल्या हॉटेलातला लहानसा कॉन्फरन्स हॉल अर्ध्या दिवसासाठी भाड्याने घेऊन तिथे हे समारंभ साजरे झाले. उपस्थित असलेले काही आप्तेष्टही अर्ध्या दिवसाची रजा घेऊन आले होते. सगळा कार्यक्रम 'औटसोर्स' केलेला असल्यामुळे घरातली मंडळीसुध्दा वेळेवर पाहुण्यांसारखी आली आणि कार्यक्रम उरकून परत गेली. एक कौटुंबिक आणि मित्रमैत्रिणींचा मेळावा किंवा 'फॅमिली अँड फ्रेन्ड्स गेट टुगेदर' असेच याचे स्वरूप दिसले आणि बहुधा तेवढाच मर्यादित उद्देश त्याच्या आयोजनाच्या मागे असावा. याबद्दलसुध्दा मी व्रतबंध या विषयावर दोन लेख पूर्वी या स्थळावर लिहिले आहेत.

या सगळ्यांची आता आठवण होत आहे कारण या महिन्यात पुन्हा एकदा मध्यप्रदेशातल्या समृध्द गावी असाच एक महोत्सव पहायला मिळाला. आजकाल मे महिन्यामध्ये रेल्वेची तिकीटे आयत्या वेळी मिळणे अशक्य झाले आहे याचा विचार करून या समारंभाचा मुहूर्त चार महिन्यांपूर्वीच ठरवून आमंत्रणे केली गेली होती. तरीसुध्दा पुण्याहून येणा-या काही मंडळींना सोयिस्कर गाडीचे रिझर्वेशन मिळालेच नाही. इतर काही लोकांनासुध्दा मिळेल त्या गाडीचे आणि मिळेल त्या वर्गाचे तिकीट काढून ठेवावे लागले. असे असले तरी बोलावलेल्यांपैकी जवळ जवळ ऐंशी ते नव्वद टक्के आप्तेष्टांनी हजेरी लावली.

मध्य भारतामधला मे महिन्याचा कडक उन्हाळा अपेक्षित होताच. रेल्वेगाडीच्या एअरकंडीशन्ड स्लीपर डब्यातून बाहेर पडून रेल्वे स्टेशनवर पाय ठेवताच त्याची तीव्र धग जाणवू लागली. कार्यस्थळ मात्र अत्यंत सुखावह होते. तिथल्या ऐतिहासिक वाड्याच्या मातीच्या जाड भिंतींमधून ऊष्णतेचा तितकासा शिरकाव आतपर्यंत होत नाही, शिवाय प्रत्येक खोलीगणिक कूलर बसवून आतली हवा थंड ठेवली होती. समोरच्या पटांगणात मोठा मांडव घालून जवळ जवळ सगळी मोकळी जागा आच्छादित केली होतीच, त्यातही जागोजागी कूलर ठेवून थंड हवेचे झोत सोडले होते. आजूबाजूला बरीच मोठमोठी झाडे असल्यामुळे हवेत थोडा नैसर्गिक थंडावाही आला होता. या सगळ्यांमुळे मांडवातले वातावरण थंडगार नसले तरी सुसह्य झाले होते.

मुंजीच्या कार्यक्रमाच्या दोन दिवस आधीपासूनच पटांगणात मांडव घातला होता, तसेच जवळच्या शहरातला एक मोठा केटरर त्याच्या वीस पंचवीस सहाय्यकांना सोबत घेऊन दाखल झाला होता. आम्ही जाऊन पोचलो तेंव्हा मांडवाच्या एका भागात टेबलांची लांबचलांब रांग लावून ठेवलेली दिसली. सकाळचा नाश्ता, दोन्ही वेळची भोजने आणि दोन वेळा चहा कॉफी वगैरे सगळे काही केटररने पुरवायचे होते. जेवणाखाण्याच्या वेळी सगळे पदार्थ टेबलांवर मांडून ठेवले जात होते. ते गरम राहण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या शेगड्या आणि खास बनावटीची अन्नपात्रे आणलेली होती. वाढण्यासाठी विशिष्ट गणवेशधारी वाढपी (वेटर) उभे असायचे. इतक्या ऊष्ण हवेत टाय परिधान करून ते लोक कसे काम करत असतील याचे मला नवलही वाटत होते आणि त्यांची दयाही येत होती. हे लोक सोडल्यास संपूर्ण गावात एकही टायधारी माणूस दिसला नसता.   

मुंजीसारख्या धार्मिक विधीचे ज्ञान असणारे भटजीसुध्दा आता दुर्मिळच झाले असणार. या कार्यासाठी एका वेदशास्त्रसंपन्न पुरोहितांना बाहेरून बोलावले होते. मध्यप्रदेशाकडच्या आषेत सगळ्या भटजींना सगळेच लोक 'गुरू' म्हणतात. त्या भागात 'गुरू' ही एक उपाधी असते. पुण्याहून आलेले हे 'एकनाथगुरू' बहुधा अजून विशीतलेच असतील, पण सर्व धार्मिक विधी शिकलेले होते. मूळ कर्नाटकामधून धार्मिक मंत्रांचे शिक्षण घेऊन ते पुण्याला आले आणि विविध प्रकारची धार्मिक कृत्ये करण्यासाठी त्यांचे भारतभर भ्रमण चालले असते. असेच एक तेलुगूभाषिक स्वामी की मूर्ती मला इग्लंडमध्ये भेटले होते. मला हे दोघेही गृहस्थ म्हणजे 'एंटरप्राइजिंग' माणसे कशी असतात याची उदाहरणे वाटली. नम्रता, वाक्चातुर्य, व्यवहारकुशलता, लवचीकपणा यासारखे त्यांच्यातले काही गुण अगदी थोड्या वेळाच्या सहवासातसुध्दा मला जाणवले.

खांद्यावर नॅपकीन टाकून एक गृहस्थ मांडवात सगळीकडे फिरतांना दिसत होता. केंव्हाही कुणालाही कशाचीही गरज पडली तर ते काम त्याला सांगितले जात होते आणि ते काम तो लगेच करवून घेत होता. मग ते काम म्हणजे विटा रचून हवनासाठी कुंड तयार करायचे असो किंवा मंगलाष्टकाच्या फोटोकॉपी काढून आणायच्या असोत. इलेक्ट्रशियन, प्लंबर वगैरे सर्व्हिसेससाठी तो सिंगल पॉइंट काँटॅक्ट दिसत होता. पुलंच्या नारायणाचा हा आधुनिक अवतार असावा असा विचार माझ्या मनात येऊन गेला. पण त्याचा रुबाब पाहता त्याला 'इव्हेंट मॅनेजर' म्हणावे असे मला वाटले. त्याच्या हाताखाली प्रत्यक्ष काम करणा-या सेवकांची फौज होती. त्या सर्वांवर तो लक्ष ठेवत होता. या कामासाठी त्याला मुद्दाम नेमला होता की कंत्राट दिले होते की तो मैत्रीचे कर्तव्य पार पाडत होता हे मला समजले नाही. या मंगल कार्याला आलेल्या बहुतेक सगळ्या नातेवाईक मंडळींना मी ओळखत तरी होतो किंवा माझ्याशी त्यांची ओळख करून दिली गेली. पण हे गृहस्थ मात्र सारखे समोर येत असले तरी कोणीही त्यांची माझ्याशी ओळख करून दिली नाही. त्यामुळे मला तो नातेवाईक वाटला नाही.

 . . . . .  . . . . . . . . .  (क्रमशः)

Monday, May 20, 2013

बाहुलाबाहुलीचे लग्न - भाग २


बाहुलाबाहुलीचे लग्न ज्या घरासमोरील मांडवात होणार होते त्याच्या शेजारच्या घरात आम्ही उतरलो होतो. अक्षयतृतियेच्या दिवशी सकाळी उठून पाहतो तो तिथल्या दिवाणखान्यात हनुमानाचा एक मोठा पोस्टर ऊभा करून ठेवलेला होता. हे मारुतीराया असे अचानकपणे इथे कशासाठी प्रकट झाले हे मला त्यावेळी समजले नाही. नऊ सव्वानऊ वाजण्याच्या सुमाराला परगावाहून आलेली पाहुणे मंडळी हळू हळू मांडवात जाऊ लागली आणि तिथे मांडून ठेवलेल्या खुर्च्यांवर स्थानापन्न.होत राहिली. पारंपरिक वेशभूषा परिधान करून गौरीसारख्या छान सजलेल्या गावातल्या गोड बालिकाही आपापल्या मातामाउलींच्यासह तिथे यायला लागल्या. मांडवातल्या प्रेक्षकांमध्ये मुख्यतः स्त्रीवर्गाचा भरणा होता. त्यामुळे बोटांवर मोजता येण्याइतके पुरुष एका बाजूला जरा मागच्या रांगांमध्ये जाऊन बसले. मुलींची पुरेशी गणसंख्या झाल्यानंतर त्यातला एक गट आणि जमलेली दोन चार मुले मिळून तो ग्रुप नवरा मुलगा बनवलेल्या बाहुल्याला घेऊन शेजारच्या घरापर्यंत मिरवत गेला आणि नवरदेवाला मारुतीचे दर्शन घडवून पुन्हा वाजत गाजत परत आला. मुलींचा दुसरा गट हातात तबके घेऊन त्यांच्या स्वागतासाठी सिध्द होऊन उभा होता. देवदर्शन करून 'बाराती' परत येताच त्यांनी पंचारती ओवाळून त्यांचे स्वागत केले.

मांडवाच्या मधोमध एका मोठ्या टेबलावर गालिचा अंथरून आणि त्याच्या चहूबाजूला खांब उभे करून लग्नसोहळ्यासाठी सुरेख मंच तयार केला होता आणि त्याला पताका, माळा वगैरेंनी छान सुशोभित केला होता. नवरदेव भावल्याला त्यावर एका बाजूला उभा करून त्याच्या समोर अंतरपाट धरला गेला. नुकतीच मुंज झालेले दोन बटू धोतरे नेसून आणि उपरणे पांघरून भटजीच्या वेषात तयार होऊन आले होते. त्या टेबलाच्या दोन बाजूंना ते उभे राहिले आणि त्यांनी अंतरपाट हातात धरला. मुलींचा एक गट नवरी मुलगी म्हणून सजवलेल्या भावलीला घेऊन आला आणि तिला अंतरपाटाच्या दुस-या बाजूला उभी केली. त्या मांडवात आदल्या दिवशी झालेल्या मुंजीसाठी आलेले खरोखरचे गुरूजीसुध्दा तरुण आणि रसिक होते. त्यांनी पुढे येऊन "स्वस्तिश्रीगणनायकम्" वगैरे म्हणून मंगलाष्टकांची सुरुवात करून दिली.

त्यानंतर एका मुलीने तिच्या सुरेल आवाजात मंगलाष्टक गायला सुरुवात केली. तिथल्या एका संगीतप्रवीण बाईंनी त्याला साजेशी अशी खूप मधुर चाल लावली होती. ती चाल 'गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' या मीटरवर असल्यामुळे त्यासाठी मंगलाष्टकांच्या शब्दरचनेमध्ये थोडे बदल केले होते. पेटीच्या साथीवर ते गाणे गाण्याची चांगली प्रॅक्टिसही करून घेतली होती. त्यानुसार त्यांनी पेटीवर साथ केली आणि त्या मुलीने संपूर्ण मंगलाष्टक व्यवस्थितपणे म्हंटले. रिहर्सल ऐकून इतर मुलींनासुध्दा ते पाठ झाले असावे, कारण त्यासुध्दा दबलेल्या सुरात साथ देत होत्या. लग्नसमारंभाला जमलेल्या सर्व मंडळींनी गोंगाट न करता शांतता राखली आणि संपूर्ण मंगलाष्टक ऐकून घेतले असे मी या वेळी पहिल्यांदाच पाहिले. पुन्हा गुरूजींनी पुढे येऊन ''तदेव लग्नम्'' वगैरे म्हणून झाल्यानंतर वधूवरांनी गळ्यात माळा घालायचा कार्यक्रम झाला. हिंदी सिनेमाच्या प्रभावामुळे या वेळी नव-या मुलाला उचलून धरण्याचा प्रघात पडू लागला आहे. एका बाजूने भावला आणि दुस-या बाजूने भावली यांना शक्य तितके उचलून झाल्यानंतर अखेर 'वाजवा रे वाजवा' झाले. दोन्ही भावल्यांच्या वतीने दोन मुलींनी वरमाला घातल्या. त्यानंतर नवरानवरींना म्हणजे त्या बाहुल्यांच्या जोडप्याला मंचावर एकत्र उभे करून ठेवले. या सोहळ्यासाठी बाहुल्यांची खास जोडी शोधून आणली होती. त्यांचे पेहराव, अलंकार, चेहे-यावरील भाव वगैरे सगळेच अफलातून होते.

थोड्या वेळाने 'विहिणींची पंगत' जेवायला बसली. त्यात सर्व बच्चे कंपनीला अमोरासमोर दोन रांगांमध्ये बसवून खाऊ घातले. सकाळचे दहा सव्वादहाच वाजले असल्यामुळे दोन तीन निवडक मुख्य पदार्थांचा 'ब्रंच' आयोजित केला होता. माइकवर 'अग्गोबाई ढग्गोबाई', 'मी बाबांचा ढापला फोन', 'नक्को ताई रुसू' यासारखी बालगीते लावली होती. 'विहिणबाई विहीणबाई चला आता उठा, स्वैपाकाचा तुम्ही तर केला चट्टामट्टा' या गाण्याचा गंमत म्हणून उल्लेख केला गेला, पण ''तिकडे लक्ष न देता सर्वांनी सावकाश मनसोक्त जेवावे, हवे असतील ते पदार्थ वाटेल तेवढे मागून घ्यावेत'' अशी सूचनाही केली गेली. अर्थातच मुले या वातावरणात तेच करणार याची सर्वांना खात्री होती. अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात सगळा कार्यक्रम चालला होता. लग्नासाठी सुरेख रुखवत मांडून ठेवलेले होते. त्यात लहान लहान सोफासेट, पलंग, कपाटे वगैरे फर्निचर होतेच, रेफ्रिजरेटर, गॅस, कुकर, फूड प्रोसेसर वगैरे स्वयंपाकघरातल्या वस्तूही होत्या. आजकाल बहुतेक लहान मुलींच्या खेळामध्ये असल्या गोष्टी बहुधा असतातच. थोड्या चांगल्या क्वालिटीच्या नव्या वस्तू घेऊन त्या रुखवतात मांडल्या होत्या. शिवाय पिटुकल्या आकाराचे फराळाचे पदार्थ वगैरे सजवून ठेवले होते. मुलांना जेवायला वाढून झाल्यानंतर मोठ्या लोकांनाही डिशेस भरून दिल्या गेल्या आणि सावकाशपणे गप्पा मारत सर्वांनी त्याचा चवीने उपभोग घेतला.  

जमलेल्या मुलामुलींनी यजमानीण मुलींना भेटवस्तूंचा आहेर केला. त्यांनीही सुरेख 'रिटर्न गिफ्ट्स' आणून ठेवलेले होतेच ते सर्वांना वाटले. त्या सगळ्यांचे तोंडभर कौतुक झाले. ज्यांच्या बरोबर लहान मुले आलेली नव्हती अशा मोठ्या लोकांनी पण स्निग्धा आणि गिरिजा यांच्यासाठी काही ना काही आणले होतेच. व्यवस्थितपणे आखणी आणि त्यानुसार तयारी करून एक मजेदार 'इव्हेंट' सुरळीतपणे पार पाडल्याबद्दल सगळ्यांनी मेधाची पाठ थोपटली आणि एक वेगळा अनुभव घेऊन ते परतले, 



Sunday, May 19, 2013

बाहुलाबाहुलीचे लग्न - भाग १


दोन महिन्यांपूर्वी अचानक मेधाचा मेसेज आला, "आम्ही स्निग्धाच्या भावलाभावलींच्या (लुटुपुटीच्या) लग्नाचा समारंभ करणार आहोत, त्यासाठी तुम्ही मंगलाष्टके लिहून द्याल का?" असे तिने त्यात विचारले होते. माझ्या लहानपणी म्हणजे मी शाळेत शिकत असतांना आमच्या घरातल्या एका लग्नसमारंभासाठी कामचलाऊ मंगलाष्टके तयार केली होती. थोडी गंमत, थोडी हौस आणि थोडी शाबासकी मिळवण्याची इच्छा त्याच्या मुळाशी होती. पण त्यामुळे 'मंगलाष्टकवाला' असा शिक्का माझ्या नावावर बसला आणि त्यानंतर आमच्या घरात जितकी मंगलकार्ये झाली त्यातल्या बहुतेक वेळी मंगलाष्टकाचे 'काम' माझ्यावर सोपवले गेले. लग्न झाल्यानंतर माझ्याबद्दलची ही 'कीर्ती' माझ्या सासुरवाडीपर्यंत जाऊन पोचली आणि तिकडच्या मंगलकार्यांसाठी पण मला अधून मधून 'विनंत्या' येऊ लागल्या. मलाही त्यात मजा वाटत असल्यामुळे मीही त्यांना मान देत गेलो. हे सगळे गेल्या चाळीस पन्नास वर्षांपासून चालत आले आहे. त्यामुळे माझे भाऊ बहिणी आणि मेहुणेमेहुण्यांपासून ते त्यांच्या मुलाबाळांपर्यत अनेकांच्या लग्नात म्हणण्यासाठी मी मंगलाष्टके (खरे तर मंगलपंचके) करून दिली. पण आता त्यांच्या मुलींच्या बाहुलाबाहुल्या म्हणजे आणखी दोन पिढ्या पुढच्या झाल्या. त्यांच्यासाठी काय योग्य होईल हा एक प्रश्नच होता. याबद्दल मेधाशीच बोलून घ्यायचे ठरवले.  

तिने याबद्दल जास्त खोलवर विचारच केला नव्हता असे तिच्या बोलण्यातून दिसले. लग्न लावण्यासाठी मंगलाष्टके 'लागतात' आणि तिच्या लग्नातली मंगलाष्टके मीच करून दिली असल्यामुळे ती माझ्याकडून मिळू शकतात एवढे तिला ठाऊक होते. मी 'नाही' म्हंटले असते तर तिने आणखी कोणाला विचारले असते. मलाही हे काम थोडे इंटरेस्टिंग वाटले होते. पण होकार देऊन ते काम सुरू करण्यापूर्वी निदान त्याची चौकट तरी ठरवून घेणे आवश्यक होते. त्या बाबतीत मेधाने मला संपूर्ण स्वातंत्र्य दिले.

आपल्याकडची परंपरागत मंगलाष्टके 'शार्दूलविक्रीडित' या थोड्या अवघड वृत्तात असतात. यातले 'याकुंदेंदुतुषारहारधवला' यासारखे संस्कृत भाषेमधले श्लोक छोटी स्निग्धा अस्खलितपणे म्हणून दाखवते हे मला माहीत होते. मी स्वतः तिच्या वयाचा असतांना मलाही ते अवगत होते, पण तेंव्हा त्यातील एका शब्दाचाही अर्थ समजत नव्हता किंवा त्याला काही अर्थ असतो याचादेखील त्यावेळी कदाचित पत्ता नसावा. प्रत्यक्षातल्या लग्नसमारंभांमधल्या मंगलाष्टकांबद्दलसुध्दा बहुतेक वेळा हेच होत असते. ती लक्षपूर्वक ऐकून त्यातल्या शब्दांचा अर्थ किंवा त्यातला भाव समजून घेण्याच्या मूडमध्ये त्या वेळी कोणीही नसतो. असे असले तरी या लहान मुलांच्या कार्यक्रमात मात्र त्यांना सगळ्या विधींमध्ये गोडी वाटायला हवी असे मला वाटले.

हा कार्यक्रम संपूर्णपणे लहान मुलामुलींनी मिळून साजरा करायचा असेल असे गृहीत धरले तर मंगलाष्टके म्हणण्याचे कामही त्यांच्यातलीच कोणी चिमुरडी मुले किंवा मुली करणार. त्यामुळे त्यांना समजतील असे सोपे शब्द आणि लहान लहान वाक्ये त्यात असायला हवीत, त्याला 'गेयता' आणण्यासाठी ते शब्द ठेक्यात बसायला हवेत आणि त्याला 'काव्य' म्हणायचे झाल्यास त्याची यमके जुळायला हवीत. एवढे प्राथमिक नियम मीच ठरवून घेतले आणि मंगलाष्टकांमधला आशय ठेऊन हळूहळू सुचतील तशा काही ओळी तयार केल्या. भावलाभावलींचा हा लग्नसमारंभ आणि त्यातले मंगलाष्टक याबद्दल काही निश्चित समजण्यापूर्वीच ती पाठवून देण्याची घाई करण्यात अर्थ नव्हता. काही दिवसांपूर्वी मेधानेच त्याबद्दल चौकशी केल्यानंतर ती रचना तिच्याकडे पाठवून देऊन तिच्या सुपूर्द केली. तिने लगेच उत्तर पाठवून धन्यवाद कळवले आणि त्यात आणखी काही गोष्टींचा समावेश करता येईल का असे विचारले. त्यासाठी आणखी चार ओळी जमवून पाठवल्या आणि त्यात कसलेही फेरफार करायला माझी मुळीच हरकत नाही हे सुध्दा कळवले. ई मेलद्वारा याहून अधिक काही करता येण्यासारखे नव्हते आणि त्याची गरजही नव्हती.

मी पाठवलेली रचना अशी होती. परंपरागत आरत्यांच्या ठेक्यावर ती लिहिली असली तरी ती बालगीतांसारखी म्हणायची होती. उदाहरणादाखल 'झुकझुक झुकझुक अगीनगाडी, धुरांच्या रेघा हवेत काढी' या दोन ओळीसुध्दा याच ठेक्यावर गाता येतात. म्हणजेच माझे मंगलाष्टक या गाण्याच्या मीटरमध्येसुध्दा बसत होते.
               
गणपती बाप्पा लौकर चला ।  सांगा धावाया उंदिरमामाला ।।
महालक्षुमी अंबेजोगाई । देवी शारदा भवानी आई ।।
सा-याजणी या कृपा करून । सर्व देवांना सवे घेऊन ।।
लग्नाचा आम्ही मांडला थाट । आशीर्वाद द्या होऊ दे नीट ।।
भावला आमचा देखणा धीट । खूप हुषार थोडा चावट ।।
नाजुक सुंदर गोड भावली ।  लाजरी नवरी छान सजली ।।
स्निग्धा बघा कशी दिसते छान । नवे अलंकार वस्त्रे लेवून  ।।
गिरिजाचा तर किती दिमाख । मस्त दागिने नवा पोशाख ।।
त्यांच्या मैत्रिणी सया जमल्या । कुणी विहिणी अन् करवल्या ।।
सजून धजून रुबाबदार । ऐटीत हिंडे राजकुमार ।।
भुस्कुट्यांचा हा कुलदीपक । गोड दिसतो बाळ शौनक ।।
टिमारणीच्या सुरम्य स्थळी । पाहुण्यांनी ही गढी फुलली ।।
ताशे वाजंत्री करती डुमडुम । फटाके फुटती धडाड्ड धुम्म ।।
खाण्यापिण्याची केली चंगळ । लाडू चिवडा यांचा फराळ ।।
गोड पक्वान्ने मसालेभात । मस्त जमली पहा पंगत ।।
वरात काढू थाटामाटात । बँडबाजावर नाचत गात ।।
अशी सारी मस्त करू धमाल । गुड्डागुड्डीचे शुभमंगल ।।

त्यात मंगलाष्टकांचा 'फील' येण्यासाठी अखेरच्या दोन ओळी 'शार्दूलविक्रीडित' या वृत्तात लिहिल्या होत्या.

झाली वेळ मुहूर्त आज शूभ द्या आशीर्वचा मंगल ।
नांदा सौख्यभरे शुभंभवतु अन् कूर्यात सदा मंगल ।।
सुमुहूर्त सावधान ।।

१२ मे च्या मुहूर्तावर त्यांच्या परिवारामध्येच व्रतबंधाचा समारंभ होणार होता आणि त्या निमित्याने खूप पाहुणे मंडळी जमणार होती, त्याचा लाभ घेण्याच्या दृष्टीने हे बाहुलाबाहुलीचे लग्न लगेच दुस-या दिवशी ठेवले होते. त्यासाठी पण मेधाने एक सुरेख निमंत्रणपत्रिका तयार करून ती इंटरनेटवर सर्वांना पाठवली. लग्नकार्याची सगळी तयारी अगदी तपशीलवार करून ठेवली होती.

.  . . . . . . . . . .  (क्रमशः)

Wednesday, May 08, 2013

दूरसंचार किंवा टेलिकम्यूनिकेशन



आपण बोलतो तेंव्हा तोंडामधून निघणारा आवाज ध्वनिलहरींमधून आपल्या आजूबाजूला पसरत जातो. जवळच असलेल्या दुस-या माणसाच्या कानापर्यंत तो पोचतो आणि त्याला आपले बोलणे ऐकू येते. त्याचप्रमाणे आपल्यावर पडलेला प्रकाश परिवर्तित होऊन सगळीकडे पसरत जातो. जवळच असलेल्या दुस-या माणसाच्या डोळ्यांपर्यंत तो पोचतो आणि त्यामुळे त्याला आपण दिसतो. हा माणूस आपल्यापासून दूर जात असतांना त्याला ऐकू येणारा आपला आवाज क्षीण होत जातो आणि काही अंतर गेल्यावर तो पूर्णपणे थांबतो. त्याला आपले बोलणे ऐकू आले नाही तरीसुध्दा आपण दिसत असतो. पण त्याला दिसत असलेली आपली आकृती दूर जाता जाता लहान लहान आणि अस्पष्ट होत जाते आणि अखेर तीही दिसेनाशी होते. तांब्याच्या तारेमधून वाहणारा विजेचा प्रवाह मात्र फारसा क्षीण न होता याही पेक्षा जास्त अंतरावर जाऊन पोचतो. विजेच्या या गुणधर्माचा उपयोग टेलिफोनमध्ये केला जातो. त्याच्या एका बाजूच्या उपकरणामधील मायक्रोफोनमध्ये बोललेल्या आवाजाचे रूपांतर विद्युत लहरींमध्ये होते. त्या लहरी तारेमधून दुस-या बाजूच्या उपकरणापर्यंत (रिसीव्हरपर्यंत) वहात जातात. तिथे असलेल्या  स्पीकरमध्ये या विद्युत लहरींचे रूपांतर पुन्हा आवाजामध्ये होते आणि तिकडच्या माणसाला ते बोलणे जसेच्या तसे ऐकू जाते. अशा प्रकारे दूर असलेल्या व्यक्तीबरोबर यंत्रांद्वारे संपर्क करण्याला 'टेलिकम्यूनिकेशन' (दूरसंचार) किंवा 'टेलकॉम' म्हणतात.

आपल्या कानांना ऐकू न येणा-या किंवा डोळ्यांना न दिसणा-या 'रेडिओ वेव्हज' या प्रकारच्या लहरी आभाळामधून दूरवर पसरत जातात. रेडिओस्टेशनमधील उपकरणांमध्ये मूळ आवाजांचे रूपांतर विद्युत लहरींमध्ये होते आणि  तिथे तयार केलेल्या या विद्युत लहरींची सांगड रेडिओ वेव्हजशी घालून त्यांचे प्रसारण केले जाते. जगभरामधील असंख्य रेडिओ स्टेशनमधून निघालेल्या या लहरी आपल्या आसपास भिरभिरत असतात. आपल्याला हव्या असलेल्या स्टेशनमधून आलेल्या लहरी आपल्याकडील रेडिओमध्ये वेगळ्या काढल्या जातात, त्यांचे 'अँप्लिफिकेशन' करून म्हणजेच त्यांची तीव्रता वाढवून त्या स्पीकरला दिल्या जातात आणि स्पीकरमध्ये त्यांचे पुन्हा आवाजात रूपांतर होऊन आपल्याला तो कार्यक्रम ऐकू येतो. साधारणपणे अशाच प्रकारच्या क्रिया टेलिव्हिजन स्टेशनमध्ये दृष्यांच्याही बाबतीत घडतात आणि तिथून प्रसारित केलेली स्थिर किंवा चलचित्रे आपल्याला घरबसल्या दिसतात, त्यांच्याबरोबर ध्वनीसुध्दा ऐकायला मिळतात. प्रत्यक्ष जगातले आवाज निर्माण झाल्यानंतर क्षणार्धात विरून जातात पण ते रेकॉर्ड करून ठेवण्याची सोय झाल्यानंतर आधी तबकड्यांमध्ये आणि नंतर फितींमध्ये (टेपवर) ते साठवून ठेवता आले आणि त्यांना फोनोग्रॅम किंवा टेपरेकॉर्डरवर वाजवून ते ध्वनि पुन्हा पुन्हा ऐकता येणे शक्य झाले. पुढे जाऊन यात अधिक सुधारणा होत गेल्या. अलीकडल्या काँप्यूटर क्रांतीनंतर हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क, काँपॅक्ट डिस्क (सीडी), डीव्हीडी, पेन ड्राइव्ह असे अनेक प्रकारचे स्मृतिकोष (मेमरी) तयार होत गेले आणि आपल्याला हवे ते ध्वनि किंवा चित्रे त्यात साठवून ठेवता आली.

टेलीफोन आणि रेडिओ या वस्तू लहानपणीच माझ्या ओळखीच्या झाल्या होत्या. लग्न करून आपले स्वतंत्र घर थाटेपर्यंत टेलिव्हिजन आणि टेपरेकॉर्डर यांची त्यात भर पडली. अर्थातच या गोष्टींनी घरातली बरीच जागा व्यापून टाकली. एकाच प्रकारचे काम करणारे पण निरनिराळे अँप्लिफायर आणि स्पीकर या उपकरणांमध्ये असतात. कालांतराने रेडिओ आणि टेपरेकॉर्डर यांना एकत्र आणून 'टू इन वन' उपकरण आले त्यामुळे थोडी जागा वाचली, पण रेकॉर्ड केलेली चलचित्रे दाखवणारे व्हीसीआर आले आणि त्यांनी अधिक जागा काबीज केली. नव्वदीच्या दशकात घरातले संगणक (पीसी) आले आणि त्यांच्या पाठोपाठ आलेल्या आंतर्जालाने (इंटरनेटने) टेलिकॉमच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्यापूर्वी फक्त रेडिओ स्टेशन किंवा टेलिव्हिजन ट्रान्स्मिशनमधून येणारे कार्यक्रम आपण पाहू किंवा ऐकू शकत होतो. या क्रांतीनंतर दूर कुठेतरी कुणीतरी कसलाही ध्वनि, चित्रे किंवा मजकूर अपलोड करावा आणि आपण घरबसल्या आपल्या पीसीवर तो ऐकावा, पहावा किंवा वाचावा हे सगळे शक्य झाले. ध्वनि, चित्रे किंवा मजकूर यांचे आधी विजेच्या लहरींमध्ये रूपांतर करणे आणि त्यांचे प्रक्षेपण करणे ही कामे आता आपण आपल्या घरी बसून (कदाचित आपल्याही नकळत) करत असतो. तसेच इतरांनी केलेले प्रक्षेपण अतिसूक्ष्म लहरींमधून आपल्या आसपास भिरभिरत असते, त्यातले आपल्याला हवे तेवढे उचलून घेऊन त्यांचे ध्वनि किंवा आकृती यांमध्ये रूपांतर करण्याचे काम आपला संगणक करत असतो. हे काम करण्यासाठी त्यातसुध्दा मायक्रोफोन, अँप्लिफायर आणि स्पीकर असावे लागतात.

दूरसंचारासाठी लागणारे संदेश ('टेलिकम्यूनिकेशन'चे सिग्नल्स)) इकडून तिकडे पाठवण्याच्या पध्दतींमध्येही आमूलाग्र बदल होत गेले. तारायंत्र (टेलिग्रॅम) आणि दूरध्वनि (टेलिफोन) यांचे व्यवहार जगभर पसरलेल्या तारांच्या जाळ्यामधून होत असत. रेडिओ आणि टेलिव्हिजनचे प्रसारण त्यासाठी खास उभारलेल्या उंच अशा टॉवरच्या माथ्यावर बसवलेल्या ट्रान्स्मिटरमधून होत असे. अशा टॉवर्सची गणना शहरामधील, देशामधील किंवा जगामधील सर्वात उंच स्ट्रक्चर्समध्ये होत असे. तिकडून आलेले सिग्नल ग्रहण करण्यासाठी घराघरांवर अँटेना लावलेले असत. काही काळानंतर अशा व्यक्तीगत अँटेनांच्या ऐवजी केबलमधून टीव्हीचे सिग्नल घेणे सुरू झाले. त्यानंतर आता पुन्हा एकदा व्यक्तीगत डिश अँटेनांचे युग आले आहे. टीव्ही प्रोग्रॅम्सचे सिग्नल्स आता थेट अवकाशामधील (स्पेसमधील) कृत्रिम उपग्रहांवरून आपल्या घरातल्या डिशवर येतात. टूजी, थ्रीजी वगैरे तंत्रज्ञानामुळे ते आता आपल्या मोबाइल फोनवर येऊ लागले आहेत. त्यासाठी शहरांमध्ये जागोजागी मायक्रोवेव्ह ट्रान्स्मिशन टॉवर्स उभे राहिले आहेत आणि त्यामधून होणा-या किरणोत्सर्गाबद्दल अलीकडे बरीच चर्चा सुरू आहे. इंटरनेटबद्दलही साधारणपणे अशाच सुधारणा होत गेल्या. सर्वात आधी टेलिफोन लाइन्स, त्यानंतर केबल आणि आता वायरलेस कम्युनिकेशन सुरू झाले आहे.    


आपल्या घरात असलेल्या आपल्या उपयोगाच्या सगळ्या उपकरणांमध्ये ध्वनीचे रूपांतर विजेत  आणि विजेचे रूपांतर ध्वनीमध्ये करणे या समान प्रकारच्या क्रिया होत असतात. मग त्यासाठी वेगवेगळी उपकरणे कशाला हवीत? एकाच यंत्रांद्वारा ही सगळी कामे करता येणार नाही का? असा प्रश्न माझ्या मनात नेहमी उठत असे. वीस पंचवीस वर्षांपूर्वीच माझ्या अल्पमतीने मी टेलिव्हिजन आणि टेपरेकॉर्डर यांना जोडून दिले होते, त्यामुळे टीव्हीवरील गाणी परस्पर टेप करून ठेवणे आणि टेपवरील गाणी टीव्हीच्या जास्त चांगल्या स्पीकरवरून वाजवणे असे उद्योग मी करू शकत होतो. हे काम यंत्राकडून नक्कीच जास्त सुबकपणे होऊ शकले असते. टीव्हीसाठी वेगळा आणि काँप्यूटरसाठी वेगळा मॉनिटर दुप्पट जागा अडवीत होते, ते काम एकच यंत्र का करू शकणार नाही? असे विचार माझ्या मनात येत असत, पण भारतातल्या बाजारात तरी अशा प्रकारचे संयुक्त यंत्र मिळत नव्हते.आणि जागतिक बाजारपेठांमध्ये सुध्दा बहुधा ते नसावे. दहा वर्षांपूर्वीच्या त्या काळातले माझ्या कल्पनेतले असले 'ऑल इन वन' यंत्र सामान्य शोकेसमध्ये ठेवता येण्याजोगे होते आणि टेलिव्हिजन, रेडिओ, टेप रेकॉर्डर, व्हीसीआर, काँप्यूटर आणि टेलिफोन या सर्वांचा समावेश त्या यंत्रात होऊ शकला असता.

असे यंत्र बाजारात न येण्यामागे दोन कारणे असावीत. पहिले म्हणजे सर्वच ग्राहकांना या सगळ्या सोयींची गरज वाटत नसावी, मग त्यांनी नको असलेल्या गोष्टी का विकत घ्याव्यात? दुसरे कारण असे आहे की घरातला एक सदस्य टेलिव्हिजन पहात असतांना दुस-याला इंटरनेटवर जाऊन ई-मेल करायची असती आणि तिस-याला टेलिफोन आला तर ते कसे जमवून घेतील? या पेक्षा या गोष्टी वेगळ्यै असणे एका दृष्टीने बरेच होते.

दहा वर्षांपूर्वी मोबाइल फोन आले होते, पण त्यांचा उपयोग बोलणे किंवा एसएमएस टेक्स्ट पाठवणे एवढाच होता. पुढे त्याला कॅमेरा जोडला गेला आणि घाउक प्रमाणात संगीत किंवा व्हिडिओज साठवणारी मेमरी जोडली गेली. त्यामुळे त्याचा आवाका वाढत गेला. आता सेलफोनवर इंटरनेट पाहण्याची व्यवस्था झाली आहे. त्यावरून सिनेमा किंवा क्रिकेटची मॅचसुध्दा पाहता येईल. म्हणजेच आपल्याला हवे ते आवाज, हवी ती चित्रे दूरदेशी असलेल्या आप्ताला किंवा मित्राला पाठवून देऊ शकतो, त्याने पाठवलेले संदेश, चित्रे आणि आवाज वाचू, पाहू किंवा ऐकू शकतो, तसेच रेडिओ स्टेशन आणि टीव्ही चॅनेल्सवरील कार्यक्रमसुध्दा ऐकू व पाहू शकतो आणि रेकॉर्डही करू शकतो. म्हणजे मला अभिप्रेत असलेले एकत्रीकरण आता प्रत्यक्षात उतरले आहे आणि ते सुध्दा खिशात ठेवता येईल इतक्या लहान आकाराच्या यंत्रात आणि आपल्याला परवडू शकेल इतक्या खर्चात. विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील ही घोडदौड विस्मित करणारी आहे.