Sunday, December 31, 2017

वर्ष २०१७ जाता जाता

वर्ष २०१७ जाता जाता

हे वर्ष संपता संपता माझ्या मनात आलेले दोन विचार मी फेसबुकावर मांडले होते. ते एकत्र करून या पोस्टमध्ये देत आहे. गतवर्षी माझ्या जवळच्या व्यक्ती दुर्दैवाने दिवंगत झाल्या त्यांच्या आठवणीने माझ्या मनात जे चलबिचल झाले ते पहिल्या लेखात व्यक्त केले आहे. याच्या बरोबर उलट नववर्षदिनाचा जल्लोश लोकांनी करू नये अशी नकारघंटा वाजत असतांनासुध्दा लोक हा दिवस का उत्साहाने साजरा करतात याचे कारण शोधण्याचा प्रयत्न दुस-या लेखात केला आहे.
--------------------------------------------------

वियोग

नैनम् छिन्दंति शस्त्राणि नैनम् दहति पावकः। न चैनम् क्लेबयंत्यापो न शोषयति मारुतः।।
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृण्हाति नरोपराणि। तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्न्यानि संयाति नवानि देही ।।
आत्मा अमर असतो, कपडे बदलल्याप्रमाणे तो शरीरे बदलत असतो वगैरे गीतेमधले तत्वज्ञान सामान्य माणसाच्या मनाची समजूत घालू शकत नाही. जी प्रिय व्यक्ति आपल्याशी बोलते, आपल्याबरोबर खेळते, हंसते किंवा रडते, आपली काळजी करते किंवा घेते, प्रेम करते किंवा रागावते, रुसते वगैरे हे सगळे ती व्यक्ती तिच्या शरीरामार्फतच करत असते आणि ते शरीर नष्ट झाल्यानंतर हे सगळे कायमचे थांबते. त्यानंतर तिचा अमर आत्मा स्वर्गात गेला, परमात्म्यात विलीन झाला, त्याने दुसरा जन्म घेतला  किंवा इतर धर्मांत सांगितल्याप्रमाणे तो जजमेंट डे किंवा कयामतची वाट पहात शांतपणे स्वस्थ बसला असला, यातले कांहीही झाले असले तरी यापुढे त्याच्याशी आपला कसलाही संपर्क राहणार नाही या विचाराने मन अस्वस्थ होतेच.

शिशिर ऋतूमध्ये झाडांची पाने पिकून गळतात आणि वसंतात त्यांना नवी पालवी फुटते हा निसर्गक्रम असतो. शास्त्रीय भाषेत सांगायचे झाल्यास पानांमधले क्लोरोफिल हे द्रव्य नष्ट होते, ती पाने हवेमधला कार्बनडायॉक्साइड वायू शोषून घेऊन हवेला प्राणवायू देणे थांबवतात, झाडाकडून अन्नपाणी घेणे आणि झाडासाठी अन्नरस तयार करणे ही दोन्ही कामे करत नाहीत. अशी निरुपयोगी झालेली पाने गळून पडतात आणि पाचोळा होतात. माणसांच्या बाबतीत कांहीसा तसाच प्रकार होतो. नट, गायक, चित्रकार, खेळाडू वगैरे मंडळी त्यांच्या बहराच्या काळात जगाला खूप आनंद देतात, पण तो बहराचा काळ ओसरल्यानंतर ते प्रकाशाच्या झोतात रहात नाहीत, वर्षानुवर्षे कुणालाही त्यांची माहिती नसते. कधी तरी त्यांच्या निधनाची बातमी येते तेंव्हा त्यांचे चाहते क्षणभर हळहळतात, पण खरे तर त्या गुणी लोकांचे जीवंत असणे किंवा नसणे याला तोंपर्यंत इतरांच्या दृष्टीने फारसा अर्थ उरलेला नसतो.  गेल्या वर्षात अशी किती प्रसिध्द माणसे या जगाचा निरोप घेऊन देवाघरी गेली याच्या याद्या पुढल्या एक दोन दिवसात वर्तमानपत्रांमध्ये येत राहतील.

नोकरीमध्ये माझ्या आयुष्यात आलेले कित्येक लोक पंधरा वीस किंवा त्याहून अधिक वर्षांपूर्वी नोकरी सोडून गेले किंवा सेवानिवृत्त झाले आणि माझ्या संपर्कक्षेत्राच्या बाहेर गेले. त्यानंतर ते कुठे आणि कसे रहात होते की अनंतात विलीन होऊन गेले होते याची मला काहीच माहिती मिळत नव्हती.  अशातला एकादा दिवंगत झाल्याची बातमी येते आणि झर्रकन त्याच्या संबंधातल्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर येऊन जातात एवढेच होते. काही लोकांची प्रत्यक्षात भेट होत नसली तरी सोशल मीडियावर अधून मधून गाठ पडत असते आणि काही लोक अचानकपणे भेटतसुध्दा असतात. त्यांच्या सोडून जाण्याने मनाला चटका लागतो. या दोन्ही प्रकारचे तीन चार मित्र गेल्या वर्षभरात दिवंगत झाले. अशा बातम्यांमुळे दुःख होतेच, पण त्यातले जे आपल्यापेक्षा वयाने लहान असतात त्यांच्या जाण्यामुळे धक्कासुध्दा बसतो.

नातेवाईक कधी नात्यामधून रिटायर होत नाहीत. ते परगावी किंवा परदेशीसुध्दा गेले तरी संपर्कात असतात. त्यांच्याशी किती जवळचे व्यक्तीगत संबंध जुळतात आणि जुळून राहतात ते एकमेकांच्या वागण्याप्रमाणे ठरते. त्यामुळे त्यानुसार कमी जास्त तीव्रतेचे दुःख होते. त्यांचा कायमचा वियोग सहन करणे बरेच कठीण असते.

नोकरीमध्ये चांगली प्रमोशन्स मिळत गेली, व्यवसायात चांगला जम बसला, मुले मार्गाला लागली, घरात सुना, जावई, नातवंडे वगैरे आली म्हणजे माणसाच्या जीवनाची इतिकर्तव्यता संपली. अशी पिकली पाने हे जग सोडून गेली तर त्यांचे सोने झाले असे पूर्वीच्या काळात म्हणत असत. पण अशी वडीलधारी माणसे आपल्याला हवीच असतात. माझ्या दोन मोठ्या वहिनी आणि एक आत्तेबहीण यांच्याशी काही महिन्यांपूर्वीच भेट झाली होती, त्यांच्याशी प्रत्यक्षात आणि फोनवर बोलणे आणि हास्यविनोद झाला होता तेंव्हा त्यांनी अंथरूण धरलेले नव्हते. असे असतांना अचानक त्यांच्या निवर्तनाच्या मनाला सुन्न करणा-या वार्ता येत गेल्या. पुढच्या पिढीतल्या कुटुंबांचा संसार अजून पूर्ण झालेला नसतो, त्यांच्या किती तरी आशाआकांक्षा आणि योजना अर्धवट राहिलेल्या असतात. अशा वेळी त्यांच्या संसाररथाचे एक चाक निखळून पडले तर त्यामुळे होणा-या वेदना सोसवत नाहीत. माझ्या पुतणीच्या जीवनात अशी एक दुर्दैवी घटना काल घडली. आमच्या त्या सुस्वभावी जावयाला वैकुंठधामात पोचवायला जावे लागले.

वर्षभरात घडलेल्या चांगल्या घटनांचा आढावा घेणारे दहा पोस्ट्स मी गेल्या दहा बारा दिवसात बाय बाय २०१७ या शीर्षकाखाली टाकले होते, पण मनातून इच्छा नसली तरी अखेर गेल्या वर्षानेच दिलेल्या या चटक्यांचा उल्लेख करून डोळ्यांमधले आंसू पुसती ओठावरले गाणे असे म्हणत त्याला निरोप द्यावा लागत आहे. 
----------------------------------------------------------------------------------

नकारघंटा 

वॉट्सअॅप आणि फेसबुकवर रोज ज्ञानगंगेच्या अनंत धारा धो धो वहात असतात, "मार्केट में नया है" असे सांगून विनोदांच्या शिळ्याच कढीला पुनःपुनः ऊत आणला जात असतो, चमत्कृतिपूर्ण किंवा अविश्वसनीय कामे करणारी नवनवी यंत्रे, अफलातून आकारांच्या इमारती आणि निसर्ग सौंदर्याची किंवा सुंदरींची आकर्षक चित्रे आणि चलचित्रे दाखवली जात असतात, अधून मधून सुरेल गायन वादनसुध्दा ऐकायला आणि पहायला मिळते. पण संगीतामधल्या कुठल्याही वाद्यापेक्षा जास्त वेळा सोशल मीडियावर वाजवले जाणारे एक वाद्य आहे ते म्हणजे नकारघंटा.

नकारघंटा वाजवणा-यांचे अनेक प्रकार आहेत. पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा उपदेश देणारे पोस्ट फटाके नकोत, गोंगाट नको, प्लॅस्टिक नको, थर्मोकोल नको, पाणी वाया घालवू नका, अमूक करू नका, तमूक करू नका वगैरे नकार सांगत असतात. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र वगैरेंच्या काळात या नकारघंटा सतत घणघणत राहतात. त्या प्रचाराच्या तसेच कुठल्याही आधुनिक, पुरोगामी विचारांच्या नांवाने सतत शंखनाद केला जातोच, पण हॅपी या शब्दालाच संस्कृतिसंरक्षणाच्या ऐसपैस छत्रछायेत सरसकट नकारघंटा वाजवली जाते. त्यांच्या दृष्टीने हॅपी बर्थडे, हॅपी दिवाली, हॅपी होली वगैरे म्हणणे म्हणजे शांतम् पापम्. मेरी ख्रिसमस आणि हॅपी न्यू ईयर म्हणणारा तर पुरता धर्मभ्रष्टच नव्हे तर चक्क देशद्रोही असल्यासारखे दाखवले जाते. यामधले मूळ विचार बरोबरच आहेत, पर्यावरण आणि संस्कृति यांचे महत्व आहेच. माझ्या व्यक्तीगत जीवनात मी सुध्दा  माझ्या लहानपणापासून त्यांना सुसंगत असेच वागायचा प्रयत्न करत असतो.

काही लेखांमध्ये जरा विनोदी उपाय सांगितले जातात. केकच्या ऐवजी उकडीचे मोदक खा, व्हिस्कीऐवजी कडुलिंबाचा काढा किंवा गोमूत्र प्या, सांताच्या गोंड्याच्या टोपीऐवजी केशरी पटका बांधा वगैरे वगैरे.  पण त्यांची तरी काय गरज आहे ?  मुळात कोण या पोस्टा तयार करतात कोण जाणे, पण आला संदेश की त्याला ढकल पुढे असे करणारे असंख्य पोस्टमन मात्र तयार झाले आहेत. अशा एकाद्या पोस्टमनला त्याबद्दल विचारलेच तर  "मी फॉरवर्डेड अॅज रिसीव्ह्ड असे लिहिले आहे ना !" असे म्हणून बगला झटकतो. जसे काही  "आम्ही पालखीचे भोई , आम्ही पालखीचे भोई , पालखीत कोण आम्ही पुसायाचे नाही।" हे त्याचे ब्रीदवाक्य असावे. आज ज्या प्रमाणात साक्षरतेचा आणि मोबाइल फोन्सचा प्रसार झाला आहे ते पाहता हे सगळे संदेश प्रत्येक माणसाकडे नसले तरी बहुतेक सर्व कुटुंबांपर्यंत नक्कीच पोचतात. पण त्यांचा किती परिणाम होतो हा संशोधनाचा विषय आहे. 

"आपले लोक म्हणजे ना, गाढवं आहेत. त्यांच्यापुढे कितीही गीता वाचा, त्यांना ढिम्म होत नाही." असे म्हणणा-यांची मला मजा वाटते. यांना इतके समजते तर ते कशाला गीता वाचायला जातात ? या बाबतीत पहायचे झाले तर गाढव आणि माणूस यांच्यातला फरक ते नीट समजून घेत नसावेत. कुणी तरी गाढवांना कधी हंसतांना, गातांना, नाचतांना  पाहिले आहे कां ? ती नेहमी एकाद्या स्थितप्रज्ञ योग्याप्रमाणे (ही उपमा स्व.पुलंची आहे) शांत असतात, पण माणसांना मात्र आनंदाने गावे, ओरडावे, नाचावे, उड्या माराव्यात असे मनातून वाटते. त्यांना देवाने किंवा निसर्गाने हे एक प्रकारचे वरदान दिले आहे. गणेशोत्सव, गरबा, लग्नाची वरात, वाढदिवस किंवा नववर्षदिन ही फक्त निमित्ये असतात. त्यात भाग घेणा-या माणसांना आनंदाने धुंद होण्याची हौस असते हे मुख्य कारण आहे आणि ती हौस या ना त्या स्वरूपात व्यक्त होतेच.  धनाढ्य लोक एअरकंडीशन्ड डिस्कोमध्ये नाचतील तर गरीब आदिवासी रानातल्या त्यांच्या पाड्यामध्ये, कुणी भाविक टाळमृदुंगाच्या तालावर नाचत भजन करतील तर कुणी ऑर्गनच्या सुरात कॅरोल्स गातील, या सगळ्यांच्या मागे मानवी स्वभावातली ऊर्मी असते.

त्यामुळे कोणीही आणि कितीही शंखध्वनि किंवा घंटानाद केला तरी निरनिराळे उत्सव हे उत्साहात साजरे होत जाणारच. दर वर्षीप्रमाणेच या वर्षीही ख्रिसमस साजरा होऊन गेला आणि आता नववर्षदिनाच्या पार्ट्यांचा जल्लोश आणि धिंगाणासुध्दा होईल.  आणि मला वाटते की सगळे जग जेंव्हा उल्हासाने भारलेले असेल तेंव्हा आपण तरी काय म्हणून आंबट चेहरा करून काळोखात बसा ?



Wednesday, December 27, 2017

वर्ष २०१७ला निरोप (उत्तरार्ध)

संपायला आलेल्या इसवी सन २०१७ मध्ये माझ्याकडून काय काय घडले यातला कांही भाग मी यालेखाच्या पूर्वार्धात दिला होता. आणखी कांही आठवणी या भागात. ...

बाय बाय २०१७ (भाग ६) ....... दंतकथा

वयोमानानुसार माझे दांत एक एक करून मला सोडून जात होते आणि त्यांच्या जागी पार्शल डेंचर, ब्रिज वगैरे लावून माझे काम चालले होते. २०१७च्या सुरुवातीलाच शेवटचा पूलही कोसळला आणि माझ्या वरच्या दांतांची पंक्ति एकदंत झाली. आता कांहीही चावून खाणेच अशक्य होऊन गेले. दंतवैद्याकडे गेल्यावर त्याने सांगितले की आता वरच्या बाजूला संपूर्ण कवळी बसवणे हाच एक उपाय आहे. पण तिथे नवी पलटण आणून बसवण्यासाठी उरलेल्या एकांड्या खंबीर शिलेदाराला मात्र मलाच जबरदस्तीने रजा द्यावी लागली. पडलेल्या पुलांच्या आणि तुटलेल्या दांतांच्या खाली त्यांची मुळे हिरड्यांमध्ये रुतलेली होती. त्यांना खोदून बाहेर काढणे म्हणजे एक शस्त्रक्रियाच होती. ती केल्यानंतर हिरड्यांना झालेल्या जखमा भरून निघण्यासाठी आणि आलेली सूज उतरण्यासाठी दोन महिने थांबावे लागले. दांत काढल्यामुळे रिकाम्या जागेत आतल्या बाजूला गेलेला वरचा ओठ फारच विचित्र दिसत होता. त्याला  झाकण्यासाठी तिथे काही दिवस मर्दोंकी खेती (इति राजेश खन्ना) केली. यामुळे ते छायाचित्रही या दंतकथेचाच भाग आहे.
-----------------------------------------------------------------

बाय बाय २०१७ (भाग ७)

माझ्या लहानपणी आमच्या घरात आणि गांवातसुध्दा खूप धार्मिक वातावरण होते. आईवडील किंवा आणखी कोणा मोठ्यांचे बोट धरून मी नेहमीच कुठल्या ना कुठल्या देवळात जात होतो. कांही देवळांमध्ये शंभर माणसेसुध्दा दाटीवाटीने बसू शकतील असे प्रशस्त सभामंटप होते. तिथे निरनिराळे उत्सव साजरे होत असत. टाळमृदुंगांच्या तालावर एका सुरात गायिलेली भजने ऐकायला मजा येत असे, तसेच काही ह.भ.प.कीर्तनकारबुवा पुराणातल्या सुरस आणि अद्भुत कथा त्यांच्या रसाळ वाणीमधून छान रंगवून सांगत असत. अशा कार्यक्रमांना लहान मुलेसुध्दा उत्साहाने येऊन बसत. गांवापासून जवळच असलेल्या कल्हळ्ळीच्या व्यंकटेशाच्या जागृत देवस्थानावर गांवातल्या लोकांची अपार श्रध्दा होती. तिथे आणि आणखीही कांही ठिकाणी दरवर्षी उत्सवाबरोबर जत्रा भरायच्या.  त्यांची तर आम्ही मुले वर्षभर आतुरतेने वाट पहात असू. देवळात जाऊन देवदर्शन घेणे हा त्या काळात आमच्या दैनंदिन जीवनाचा भाग होता.

माझे वडील दरवर्षी नेमाने पंढरपूरची वारी करायचे. त्याशिवाय कोल्हापूर, तुळजापूर, नरसोबाची वाडी वगैरे दक्षिण महाराष्ट्रातल्या देवस्थांनांचे उल्लेख मोठ्या लोकांच्या बोलण्यात नेहमी यायचे. या सर्वांबद्दल माझ्या मनात खूप कुतूहल निर्माण झाले होते. पुढे संधी मिळेल तेंव्हा मी सुध्दा त्या देवस्थानांचे दर्शन घेतले. घरातली मोठी माणसे काशीस जावे नित्य वदावे असे म्हणायची पण त्या काळात ते फारच कठीण होते. मला मात्र पुढील आयुष्यात काशी आणि रामेश्वर या दोन्हींचे दर्शन घडले. पर्यटन आणि ऑफीसचे काम या निमित्याने मी देशभर खूप भटकंती केली. त्यात मी ज्या ज्या भागात गेलो तिथली प्रेक्षणीय स्थळे पाहिली तसेच तिथल्या प्रसिध्द देवस्थानांचे दर्शनही घेतले. अशा प्रकारे मी बराच पुण्यसंचय केला असला तरी निखळ भक्तिभावाने मुद्दाम ठरवून अशी कुठली तीर्थयात्रा केली नाही. मला तशी आंतरिक ओढही कधी लागली नाही. नोकरीच्या काळात माझे घराच्या आजूबाजूच्या देवळांमध्ये जाणेसुध्दा कमीच झाले होते.

२०१७ मध्ये मी इथल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सहवासात यायला लागलो. ती सगळी मंडळी जात्याच आणि संस्काराने भाविक प्रवृत्तीची आहेत. पूजापाठ, उपासतापास करणारी आहेत. महाशिवरात्र, एकादशी, नवरात्र यासारख्या विशेष दिवशी या वर्षी मीही त्यांच्याबरोबर इथल्या निरनिराळ्या मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन घेतले. कॉलनीमधल्या गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक आरतीच्या वेळी हजर राहून आरत्या म्हंटल्या. गणपतिअथर्वशीर्षाची पारायणे केली. लहानपणी पाठ झालेल्या आरत्या, मंत्र आणि स्तोत्रे अजूनही आठवतात याचे माझे मलाच थोडेसे कौतुक वाटले.
------------------------------------------------------------------------------------

बाय बाय २०१७ (भाग ८)

आमच्या शाळेच्या आवारात घसरगुंडी, झोपाळे, सीसॉ, उभ्या आडव्या शिड्या वगैरे साधने होती आणि लहानपणी आम्ही त्यावर मनसोक्त खेळत होतो. मी मुंबईला आलो त्या काळात चर्चगेट स्टेशनच्या जवळ आझाद मैदानात दरवर्षी कसले ना कसले प्रदर्शन लागत असे आणि त्याचाच एक भाग म्हणून जायंट व्हील, मेरी गो राऊंड वगैरे मुलांना खेळण्याची साधने ठेवलेली असत आणि तिकडेच अधिक गर्दी होत असे. त्यासाठी माफक शुल्क असे आणि मुलांबरोबर मोठी माणसेही त्यात बसायची हौस भागवून घेत असत. पुढे अशी प्रदर्शने शहराच्या इतर अनेक भागांमध्ये भरायला लागली.

झी टीव्हीचे श्री.सुभाषचंद्र यांनी एस्सेलवर्ल्ड तयार केले आणि "एस्सेलवर्ल्ड में रहूँगा मै, घर नही जाऊँगा मै।" या त्याच्या जाहिरातीने देशभरातल्या मुलांवर जादू केली. एस्सेलवर्ल्डला भेट देणे हा जिवाची मुंबई करण्याचा महत्वाचा भाग होऊन बसला. आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांना घेऊन आम्हीही एस्सेलवर्ल्डला गेलो आणि तिथली अजस्त्र यंत्रे पाहून थक्क झालो. असले जंगी रोलरकोस्टर आणि झुलते पाळणे मी यापूर्वी फक्त सिनेमातच पाहिले होते आणि ते फॉरेनमध्ये असतात असे ऐकले होते. एस्सेलवर्ल्डची प्रवेश फीच चांगली घसघशीत असली तरी एक वेगळा अनुभव घ्यायला मिळाल्यामुळे पैसे वसूल झाले. पुढे तीन चार दिवस दुखत असलेल्या अंगाने वाढलेल्या वयाची आठवण मात्र करून दिली. 

आमच्या युरोपदर्शनाच्या पर्यटनात एक संपूर्ण दिवस पॅरिसच्या जवळ डिस्नेलँडसाठी होता. आमच्या पाठीचे मणके आणि गरगरणारा मेंदू यांचा विचार करून आम्ही जास्त भयानक राइड्स टाळल्या, पण तरीसुध्दा तिथल्या अद्भुत जगात स्वतःला विसरायला लावणा-या अनेक गोष्टी होत्या. त्यालाही दहा वर्षे होऊन गेली. २०१७ मध्ये माझ्या दोन्ही मुलांनी मिळून सहकुटुंब इमॅजिकाला भेट द्यायचे ठरवले. पुण्याहून निघाल्यानंतर अडीच तीन तास प्रवास करून खोपोलीजवळ असलेल्या त्या अजब मौजउद्यानापर्यंत (अॅम्यूजमेंट पार्क) पोचल्यावर तिथे पाहतो तो गेटच्या बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. आणखी तासभर उन्हात उभे राहून तपश्चर्या केल्यावर आत प्रवेश मिळाला. पण आत मात्र जिकडेतिकडे आनंदीआनंदच पसरला होता. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या पार्कमध्ये अनेक गंमती होत्या आणि त्या सगळ्या व्यवस्थितपणे चालत होत्या. रात्री केलेली रोषणाई तर डोळ्यांचे पारणे फेडणारी होती.  आम्ही केलेल्या तपश्चर्येचे सार्थक झाले.
--------------------------------------------------------------------------------------

बाय बाय २०१७ (भाग ९)


जगप्रसिध्द ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे आयुका (Inter-University Centre for Astronomy and Astrophysics) या संस्थेची स्थापना झाली असल्याचे मला पहिल्यापासून माहीत होते, पण एनसीआरए (National Centre for Radio Astrophysics) हे नांव मी दोन वर्षांपूर्वीच ऐकले. या दोन्ही संस्था सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवाराच्या मागच्या बाजूला खडकी औंध रस्त्यावर आहेत. भारतातील अनेक विश्वविद्यालयातील विद्यार्थी आणि संशोधक आयुकामध्ये खगोलशास्त्र आणि अवकाशविज्ञानाचा अभ्यास आणि त्यावर संशोधन करत आहेत.  एनसीआरए ही संस्था मुख्यतः नारायणगांवजवळील खोदाड येथे स्थापन केलेल्या विशालकाय दुर्बिणीचे (Giant Metrewave Radio Telescope) काम पाहते.
ही अशा प्रकारची जगातील सर्वात मोठी दुर्बिण आहे आणि जगभरातले संशोधक इथे येऊन प्रयोग आणि निरीक्षणे करतात. या खास प्रकारच्या दुर्बिणीमध्ये परंपरागत दुर्बिणीसारख्या लांब नळकांड्या आणि कांचेची भिंगे नाहीत. ४५ मीटर एवढा प्रचंड व्यास असलेल्या ३० अगडबंब अँटेना मिळून ही दुर्बिण होते. या अँटेनासुध्दा १०-१२ वर्गकिलोमीटर्स एवढ्या विस्तृत भागात एकमेकीपासून दूर उभ्या करून ठेवलेल्या आहेत. यातली प्रत्येक अँटेना एका गोल आकाराच्या इमारतीच्या माथ्यावर मोठ्या यंत्रांना जोडून उभारल्या आहेत. आकाशातील विशिष्ट ग्रह किंवा तारे यांचे निरीक्षण करण्यासाठी यातली प्रत्येक अँटेना त्यावर फोकस करून त्याच्यावर नजर खिळवून ठेवावी लागते. यासाठी तिला जोडलेल्या यंत्रांमधून ती अत्यंत मंद गतीने सतत फिरवत रहावे लागते.
हे वैशिष्ट्यपूर्ण केंद्र पहायची मला खूप उत्सुकता होती, पण त्यासाठी आधी सरकारी परवानग्या घ्याव्या लागतात आणि वाहनाची व्यवस्था करायला हवी. हे कसे साध्य करावे याचा मला प्रश्न पडला होता. पण ११-१२ सप्टेंबरला मला अचानक एका मित्राचा फोन आला आणि मी एनसीआरएमधल्या इंजिनिअरांना एकादे व्याख्यान देऊ शकेन का असे त्याने विचारले. मी गंमतीत उत्तर दिले, "मी तर नेहमीच तयारीत असतो, पण माझे भाषण ऐकणाराच कुणी मिळत नाही." मला ही अनपेक्षित संधी मिळत असल्याने अर्थातच मी लगेच माझा होकार दिला.

१७ सप्टेंबर २०१७ ला खोदाडला जीएमआरटीमध्ये या वर्षीचा इंजिनियरदिन साजरा केला गेला. त्यात मुख्य पाहुणे आणि व्याख्याता म्हणून मला पाचारण करण्यात आले आणि अर्थातच जाण्यायेण्याची सोय आणि पाहुण्याला साजेशी बडदास्त ठेवली गेली. निवृत्त होऊन १२ वर्षे झाल्यानंतर मला अशा संधी क्वचितच मिळतात, ती या वर्षी मिळाली,  अनेक तरुण इंजिनियरांना भेटायला मिळाले आणि मुख्य म्हणजे जीएमआरटीमधली जगातली सर्वात मोठी रेडिओदुर्बिण विनासायास अगदी जवळून आणि आतून बाहेरून पहायला मिळाली.

-------------------------------------------------------

बाय बाय २०१७ (भाग १०)

मला समजायला लागल्यापासून आजपर्यंत माझा दिवसभरातला जास्तीत जास्त वेळ कशात जात असेल तर तो वाचन आणि लेखन यात जातो, आधी अभ्यास, मग ऑफिसमधले काम आणि सेवानिवृत्तीनंतर अवांतर, म्हणजे बोलाच्याच चुलीवर बोलाचाच तवा ठेऊन त्यावर लश्करच्या भाकरी भाजणे!
"तू हा उपद्व्याप कशाला करतोस?" असे मला कांही लोक विचारतात.
मी त्यांना सांगतो, "कारण मला इतर कांही गोष्टी करायला आवडतात, पण त्या जमत नाहीत आणि कांही गोष्टी जमतात, पण त्यात माझे मन रमत नाही. वाचन आणि लेखन मला खूप आवडते आणि थोडे फार जमते, म्हणजे कांही लोक मला तसे सांगतात."
त्यामुळे मी रिटायर झाल्यानंतर अवांतर वाचन आणि लेखन यात आपला बराचसा फावला वेळ घालवायला लागलो. आनंदघन या नावाची अनुदिनी (ब्लॉग) सुरू करून दिली, आणखी कांही खाती उघडली आणि त्यावर चार चार शब्द टाकत राहिलो. सात आठ वर्षांनंतर त्या कामाचा वेग मंद होत गेला होता. याला इतर कांही तांत्रिक, शारीरिक, मानसिक वगैरे कारणे होती, तसेच ईमेल्स, फेसबुक, वॉट्सअॅप वगैरेंच्या आगमनामुळेही ब्लॉगिंगवर परिणाम झाला होता.
या वर्षी म्हणजे २०१७मध्ये ईमेल्स, फेसबुक, वॉट्सअॅप वगैरेंचा व्याप तर वाढतच होता, पण फेसबुक आणि वॉट्सअॅप यावरील पोस्ट्स क्षणभंगुर असतात आणि आता ईमेलग्रुप्स कालबाह्य होऊ लागले आहेत. हे पाहता मी पुन्हा ब्लॉगिंगकडे जरासे जास्त लक्ष देऊ लागलो. या ठिकाणी लिहिलेले लेख बराच काळ तिथेच राहतात आणि वाचकांना कालांतरानेसुध्दा ते पाहता येतात. माझे लिहिणे कमी झाल्यानंतरसुध्दा वाचकांच्या टिचक्यांची संख्या वाढतच गेली यावरून असे दिसते. त्यांच्या सोयीसाठी मी अनुक्रणिका तयार करून त्यांच्या लिंक्स मुख्य पानावर टाकायचे काम केले.
त्याशिवाय या वर्षी मला शिक्षणविवेक या नियतकालिकाच्या वेबव्हर्जनवर लिहायची संधी मिळाली आणि मी शास्त्रीय शोध व संशोधक यांच्यावर एक लेखमालिका सुरू केली. या वर्षी मराठी विश्वकोशासाठी लेख लिहायची संधीसुध्दा मला मिळाली आणि मी तयार करून पाठवलेले पहिले दोन लेख (त्यांच्या परिभाषेत नोंदी) आता तज्ज्ञांकडे परिक्षणासाठी दिले गेले आहेत. अशा प्रकारे २०१७ मध्ये मी लेखनाच्या बाबतीत एक दोन लहानशी पावले पुढे टाकली.


Tuesday, December 26, 2017

वर्ष २०१७ ला निरोप ... (पूर्वार्ध)

हे वर्ष २०१७ संपायला आता चारपांचच दिवस उरले आहेत. ते सुध्दा हां हां म्हणता निघून जातील आणि आपण नव्या वर्षाचे स्वागत करू. अनेक लोक आताच त्या तयारीला लागले आहेत. त्यासाठी हॉटेल्स, रिसॉर्ट्स वगैरेंमध्ये बुकिंग करून ठेवले आहे, रेल्वे, बस, विमान वगैरेंची रिशर्वेशन करून ठेवली आहेत. कांही लोक घरीच पार्टी करायची तयारी करत आहेत. पण नव्या वर्षाचे स्वागत करायच्या आधी आपण थोडे मागे वळून गतवर्षाकडे पहातो. तसाच एक प्रयत्न मी या लेखात केला आहे. गेल्या वर्षात मी काय काय केले, त्यात कोणती गोष्ट नवीन किंवा वेगळी होती हे आठवून पाहिले आहे.  पण या संदर्भात कांही अगदी जुन्या आठवणीही जाग्या झाल्या. या लेखाला १० लहान लहान तुकड्यांच्या रूपात मी गेले १०-१२ दिवस फेसबुकावर टाकून  माझ्या मित्रांकडून त्यावर येणा-या प्रतिक्रिया पहात आहे. हा एक वेगळा प्रयोग मी गेल्या वर्षाच्या अखेरीला करून पहात आहे.

बाय बाय २०१७ ..... (भाग १) प्रास्ताविक

"जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका, सावध! ऎका पुढल्या हाका"
ही कवि केशवसुतांनी फुंकलेली तुतारीसुध्दा शंभर वर्षांहून जास्त जुनी होऊन गेली तरी अजून अभंग आहे. "इतिहासाचे ओझे खांद्यावरून फेकून द्या, त्याची पाने फाडून आणि जाळून टाका" अशी जळजळीत वक्तव्ये अनेकदा कानावर पडतात आणि त्या क्षणी ती बरोबर वाटतात. पण नवे पान उलटले तरी पूर्वीची काही पाने मनाच्या कोप-यात कुठे तरी लपून बसतात. त्यांच्यावर ढीगभर धूळ बसून ती दिसेनाशी झाली तरी अचानक त्यातल्या एकाद्या पानावरची धूळ पुसली जाते आणि आधी लिहिलेले लख्ख दिसायला लागते. इतकेच नव्हे तर त्यांच्या आधाराने नव्या पानांवर नव्या नोंदी लिहिणे सुरू होते असे काही अनुभव मला या वर्षात आले. पन्नास पंचावन्न वर्षे संपर्कात नसलेले कांही मित्र अचानक सापडले तर कांहींना मी शोधून काढले आणि पुन्हा त्यांच्याशी अरे तुरेच्या भाषेत बोलणे सुरू झाले. ज्या लोकांनी मला माझ्या लहानपणापासून पाहिले आहे अशी मला एकेरीत संबोधणारी  माझ्या संपर्कात असलेली माणसे आता तशी कमीच राहिली आहेत. खूप वर्षांनंतर तसे बोलणारी आणखी कांही माणसे पुन्हा भेटली तर त्यातून मिळणारा आनंद औरच असतो.
-----------------

बाय बाय २०१७ ..... (भाग २) जुने मित्र

कदाचित स्व.जगजीतसिंगांच्या समृध्द पंजाबमध्ये पूर्वीपासून सुबत्ता नांदत असेल, पण दुष्काळी भागातल्या आमच्या लहान गांवात घरोघरी मातीच्या चुली, शेणाने सारवलेल्या जमीनी आणि उंदीरघुशींनी पोखरलेल्या कच्च्या भिंती होत्या आणि त्यात अगदी पिण्याच्या पाण्यापासून अनेक गोष्टींचा खडखडाट असायचा. शहरामधल्या सुखसोयींमध्ये लाडात वाढलेल्या मुलांच्या इतके 'रम्य ते बालपण' आम्हाला तेंव्हा तरी तसे वाटत नव्हते. त्यामुळे परिस्थितीशी झगडून जरा चांगले दिवस आल्यानंतर ते लहानपण परत मिळावे म्हणून "ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो" असे म्हणावेसे वाटले नसेल पण "वो कागज की कश्ती वो बारिश का पानी" यांची ओढ मात्र वाटायची.

माझ्या लहानपणी मित्रांना "अंत्या, पम्या, वाश्या, दिल्प्या" अशा नावांने किंवा "ढब्ब्या, गिड्ड्या, काळ्या, बाळ्या" अशा टोपणनावानेच हांक मारायची पध्दत होती. माझ्या वर्गात वीस पंचवीस मुलं होती. तशा दहापंधरा मुली पण होत्या पण त्यांच्याशी बोलायलासुध्दा बंदी होती. आठदहा मुलांचे आमचे टोळके रोज संध्याकाळी ग्राउंडवर खेळायला आणि मारुतीच्या देवळासमोरच्या कट्ट्यावर बसून टाइमपास करायला जमायचे. शाळेतले शिक्षण झाल्यावर त्यातले फक्त तीन चारजण कॉलेजला जाऊ शकले होते.  इतर मुलांची नोकरीचाकरी शोधण्यासाठी कुठल्या ना कुठल्या शहरातल्या काकामामाकडे रवानगी झाली. फक्त एक सु-या फाटक तेवढा माझ्याच कॉलेजात आला होता, पण त्यानेही वर्षभरानंतर कॉलेज सोडले. दोन तीन वर्षांनंतर माझे गावी जाणे सुध्दा बंद झाले. त्या काळात संपर्काची कसलीही साधनेच नसल्याने शाळेतले सगळे मित्र जगाच्या गर्दीत हरवून गेले. क्वचित कधीतरी त्यातला एकादा योगायोगाने अचानक कुठेतरी भेटायचा, पण तास दोन तास गप्पाटप्पा झाल्यानंतर आम्ही दोघेही पुन्हा आपापल्या मार्गाने चालले जात होतो. त्या काळात  मोबाईल तर नव्हतेच, आमच्यातल्या कोणाकडे ट्रिंग ट्रिंग करणारे साधे फोनसुध्दा नव्हते. त्यामुळे मनात इच्छा झाली तरी एकमेकांशी बोलणार कसे? इंटरनेट आणि फेसबुक आल्यानंतर मी जुन्या मित्रांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना बहुधा त्या गोष्टींची आवड नसावी. त्यामुळे मला कोणीच सापडला नाही.



माझ्या पुण्यातल्या शरद या एका कॉलेजमित्राशी २०१७ मध्ये माझी नव्याने ओळख झाली आणि त्याच्याशी बोलता बोलता माझा एक गांववाला मित्र दिलीप त्याच्याही ओळखीचा निघाला. त्या सुताला धरून मी दिलीपला फोनवर गाठले आणि आता वाहनांचीसुध्दा सोय झालेली असल्यामुळे आम्ही दोघे सरळ त्याच्या घरी जाऊन धडकलो. त्या अकल्पित भेटीतून दोघांनाही झालेला आनंद शब्दात सांगता येण्यासारखा नव्हता.
-------------------------------------------------------------

बाय बाय २०१७ ..... (भाग ३) जुने मित्र


दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट। एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गांठ।
क्षणिक तेवी आहे बाळा, मेळ माणसांचा । पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ।।

कविवर्य ग दि माडगूळकरांनी अशा शब्दांमध्ये जीवनाचे एक चिरंतन अर्धसत्य सांगितले आहे. माणसाच्या जन्मापासून अखेरीपर्यंत शेकडो लोक त्याच्या जीवनात येतात आणि दूर जातात हे खरे असले तरी आप्तस्वकीयांना जोडण्याचे, त्यांना स्नेहबंधनात बांधून ठेवण्याचे त्याचे प्रयत्न चाललेले असतात आणि कांही प्रमाणात ते यशस्वी होत असतात म्हणूनच कुटुंब आणि समाज या व्यवस्था हजारो वर्षांपासून टिकून राहिल्या आहेत हे ही खरे आहे.  प्रभु रामचंद्रांनी ज्या भरताला उद्देशून हा उपदेश केला होता, त्याच्याशीसुध्दा चौदा वर्षांनी पुनः भेट होणार होतीच. आपल्या जीवनात आलेली काही माणसे काही काळासाठी दूर जातात आणि पुनः जवळ येतात असे होतच असते. काही माणसे मात्र नजरेच्या इतक्या पलीकडे गेलेली असतात आणि आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास ती संपर्कक्षेत्राच्या बाहेर गेलेली असतात की ती पुनः कधी नजरेला पडतीलच याची शाश्वति वाटत नाही. टेलीफोन, इंटरनेट आदि संपर्कमाध्यमांमुळे आज जग लहान झाले आहे आणि एका लाटेने तोडलेल्या ओंडक्यांची पुन्हा पुन्हा गांठ पडण्याच्या शक्यता थोड्या वाढल्या आहेत.


कृष्णा कामत हा माझा इंजिनियरिंग कॉलेजमधला मित्र वयाने, उंचीने आणि अंगलटीने साधारणपणे माझ्याएवढाच होता किंवा मी त्याच्याएवढा होतो. माझे बालपण लहानशा गांवातल्या मोठ्या वाड्यात तर त्याचे महानगरातल्या चाळीतल्या दोन खोल्यांमध्ये गेले असले तरीसुध्दा आमचे संस्कार, विचार, आवडीनिवडी यांत अनेक साम्यस्थळे होती. त्यामुळे आमचे चांगले सूत जमत होते. तो सुध्दा माझ्यासारखाच अणुशक्तीखात्यात नोकरीला लागला, पण त्याचे ऑफिस ट्राँबेला तर माझे कुलाब्याला होते आणि मी रहायला चेंबूर देवनारला तर तो भायखळ्याला होता. आम्ही दोघेही रोज विरुध्द दिशांनी मुंबईच्या आरपार प्रवास करत होतो आणि आराम तसेच इतर कामात रविवार निघून जात असे. पण मला कधी बीएआरसीमध्ये काम असले तर ते करून झाल्यावर मी तिथे काम करणा-या इतर मित्रांना भेटून येत असे. त्यात कामतचा पहिला नंबर लावत असे.

कामतने ती नोकरी सोडून व्यवसाय सुरू करायचा निर्णय घेतला आणि त्यासाठी तो बंगलोरला गेला. पण त्याने आपला ठावठिकाणा कुणालाच कळवला नाही. त्याच्याशी संपर्क राहिला नव्हता. मी दहा बारा वर्षांनंतर मुंबईतल्याच एका कमी गर्दीच्या रस्त्यावरून चालत असतांना अचानक तो समोरून येतांना दिसला, पण त्याच्या शरीराचा एक आवश्यक भाग असलेला असा तो सोडावॉटर बॉटलच्या कांचेसारखा जाड भिंगांचा चष्मा त्याने लावला नव्हता. हे कसे शक्य आहे असा विचार करत मी त्याच्याकडे पहात असतांना तोच माझ्या पुढ्यात येऊन उभा राहिला. माझ्या प्रश्नार्थक मुद्रेला त्याने उत्तर दिले, "अरे, काय पाहतोय्स? माझे कॅटरॅक्टचे ऑपरेशन झाले आणि चष्मा सुटला." तो आता वाशीला रहायला आला होता आणि त्याने दुसरी नोकरी धरली होती. पुढची तीन चार वर्षे आम्ही अधून मधून भेटत राहिलो, पण त्यानंतर तो पुन्हा अचानक अदृष्य झाला. या वेळी तो परदेशी गेला असल्याचे कानावर आले.


२०१७ साली म्हणजे आणखी बारा वर्षे गेल्यानंतर माझ्या बोरीवलीमध्ये रहात असणा-या माझ्या एका पत्रमित्राचा मला एक ईमेल आला. त्यात त्याने लिहिले होते की मला ओळखणारे कामत नावाचे एक गृहस्थ त्याला तिथल्या एका दवाखान्यात भेटले होते. त्याने समयसूचकता दाखवून त्यांचा फोन नंबर घेऊन मला कळवला होता. मी लगेच कामतला फोन लावला. तो बारा वर्षे गल्फमध्ये राहून नुकताच परत आला होता आणि त्याने आता बोरीवलीला घर केले होते. मी पुण्याला आलो असल्याचे आणि इथे काही जुन्या मित्रांच्या संपर्कात असल्याचे त्याला सांगितले. पुढच्या आठवड्यात आम्ही ब्रेकफास्टला एकत्र येणार असल्याने कामतने त्या वेळी पुण्याला यायलाच पाहिजे अशी त्याला गळ घातली आणि त्यानेही उत्साह दाखवला. त्यानंतर मी त्याला रोज फोन करून विचारत राहिलो आणि पुण्यात वास्तव्याला असलेल्या आमच्या नोकरीमधल्या दोन सहका-यांशी बोलून एक पूर्ण  दिवस आमच्यासाठी राखून ठेवायला सांगितले.


ठरल्याप्रमाणे कामत पुण्याला आला आणि किमया रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्टला हजर राहिला आणि आमच्या कॉलेजमधल्या जुन्या मित्रांना कित्येक म्हणजे बारा ते पन्नास  वर्षांनंतर भेटला, पण आम्हा दोघांचाही जवळचा मित्र भोजकर प्रकृतिअस्वास्थ्यामुळे  शकला नव्हता. मग लगेच त्याच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि आम्ही दोघे तिसरा एक मित्र अशोक याला सोबत घेऊन भोजकरच्या घरी गेलो आणि त्याला भेटलो. त्यानंतर आम्ही दोघेच बीएआरसीमधल्या एका मित्राकडे गेलो आणि तासाभरानंतर त्याला सोबत घेऊन दुस-या जुन्या मित्राकडे गेलो. दोन तीन दिवसांपूर्वी मला ज्याची कल्पनाही नव्हती असा इतक्या जुन्या मित्रांच्या भेटींचा योग त्या दिवशी जुळवून आणता आला तो फक्त इंटरनेट आणि टेलिफोन यांच्या मदतीमुळे. 
----------------------------------------------------------------

बाय बाय २०१७ ..... (भाग ४)

अर्थशून्य भासे मजला कलह जीवनाचा ।

अशा प्रकारच्या नकारात्मक विचारांचे मळभ सन २०१६ मध्ये घडलेल्या घटनांमुळे त्या वर्षाच्या अखेरीला माझ्या मनावर साचू लागले होते. तेंव्हासुध्दा मला कशाची कमतरता नव्हती. मुळातच मी माझ्या गरजा कधीच वाढवल्या नव्हत्या आणि परिस्थितीमधून जेवढ्या गरजा निर्माण झाल्या होत्या त्या सगळ्या माझ्या घरातली माझी माणसे मी न सांगता पुरवत होती. त्यासाठी मला कांहीच करायची आवश्यकता नव्हती, पण कशासाठीही कांहीही करावे असे न वाटणे हेच मला बेचैन करत होते.  २०१६च्या अखेरीला माझी शारीरिक आणि मानसिक अवस्था जरा दोलायमान झाली असल्यामुळे साधारणपणे तसे कांही तरी झाले होते.

याचा छडा लावण्यासाठी आम्ही हृदयविकारतज्ज्ञ (कार्डिओलॉजिस्ट) आणि मेंदूविकारतज्ज्ञ (न्यूरॉलॉजिस्ट) यांना भेटलो. त्यांनी कांही तपासण्या करून सांगितले की मला कोणता नवा विकार झालेला नाही, पण वयोमानानुसार ही इंद्रिये आता उताराला लागली आहेत. त्यांची घसरण थांबवण्यासाठी मला कांहीतरी करणे आवश्यक झाले होते. शरीराचा तोल सांभाळण्याला मदत करतील अशा काही फिजिओथेरपीच्या क्रिया दिवसातून सहा वेळा करायचा आदेश मिळाला. म्हणजे मला दिवसभरासाठी काम मिळाले. त्या थिरपीमधून २-३ महिन्यांनी माझा आत्मविश्वास वाढला आणि मी पुन्हा एकट्याने फिरायला लागलो. आता मला पुढचे पाऊल उचलायचा धीर आला.

लहानपणापासूनच मी निरनिराळी योगासने करून पहात होतो, पण ती एक गंमत म्हणून किंवा सर्कशीतल्या हालचाली करून दाखवण्यासारखे होते. मोठेपणी नोकरीला लागल्यानंतर मी काही योगासने केली नाहीत. ती करण्यासाठी वेळ न मिळणे ही सबब आणि आळस हे पुरेसे कारण होते. निवृत्त झाल्यानंतर मात्र मला योगाच्या वाटेने जावे असे वाटायचे आणि टीव्हीवरील त्याचे कार्यक्रम मी पहायला लागलो होतो, पण अमूक आजार असेल तर तमूक आसन करू नये अशा सूचनांमुळे बहुतेक सगळीच आसने माझ्यासाठी बाद झाली होती. तसेच ही आसने किंवा व्यायामाचा कुठलाही प्रकार नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच करावा अशी तळटीप सगळीकडे दिलेली असते. हे करणे कसे शक्य आहे ते कळत नव्हते.

 २०१७ साली मात्र आमच्या घरापासून जवळच चालत असलेल्या योगवर्गाला नियमितपणे जायचा माझा विचार पक्का झाला. आपल्याला बहुतेक आसने करता येणार नाहीत यामुळे इतर लोक काय म्हणतील याची लाज आणि मनातून थोडी भीतीही वाटत होती. पण माझ्याच वयाच्या एका नव्या मित्राने मला एकदा फक्त येऊन पहा अशी गळ घातली आणि मी मनात संकोच बाळगतच त्याच्यासोबत पहाटे त्या वर्गाला गेलो.

या वर्गात अनेक आसने आणि प्राणायामाचे प्रकार दररोज एका ठराविक क्रमाने केले जातात. बाबा रामदेवांच्या पतंजलि आश्रमामध्ये जाऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले प्रशिक्षक इथे रोज ही आसने दाखवतात, पण सगळ्या साधकांनी ती केलीच पाहिजेत अशी सक्ती नसते. ज्याला जेवढे जमेल, झेपेल, इच्छा होईल तेवढे त्याने करावे. माझ्यासारखेच इतर कांही ज्येष्ठ नागरिक तिथे येत होते त्यांनाही अनेक अडचणी होत्या. यामुळे मला लाज वाटायचे कारणच नव्हते आणि प्रयोग करता करता माझ्या मनातली धाकधूक हळूहळू कमी झाली. मुख्य म्हणजे नकारात्मक विचारांकडे चाललेला माझा कल पुन्हा सकारात्मक विचारांकडे झुकला. आता २०१७चा निरोप घेतांना या वर्षातली ही एक उपलब्धी आहे असे म्हणता येईल.

---------------------------

बाय बाय २०१७ ..... (भाग ५)

Man is a social animal. मनुष्यप्राणी समूहांमध्ये रहातात. असे समाजशास्त्रज्ञ सांगतात. एकाद्या माणुसघाण्या एकलकोंड्याचा अपवाद सोडला तर बहुतेक माणसांना इतर माणसांचा सहवास हवा असतो. त्यांच्या कुटुंबामधली माणसे असतातच, त्याशिवाय शेजारीपाजारी, मित्रमैत्रिणी, सहकारी वगैरे इतर अनेक लोकांशी स्नेहसंबंध जोडायचा प्रयत्न बहुतेक माणसे करत असतात. समानशीलव्यसनेषुसख्यम् । या संस्कृत उक्तीनुसार मी सुध्दा मुंबईत असेपर्यंत माझ्याशी जमवून घेऊ शकणा-या लोकांमध्ये वावरत गेलो होतो. पण पुण्याला रहायला आल्यानंतर ही पूर्वीची मंडळी दुरावली गेली.  त्यांच्या प्रत्यक्ष गांठी भेटी घडणे जवळ जवळ थांबले. पण गेल्या कांही वर्षांमध्ये इंटरनेट आणि मोबाइल फोनमुळे दूर राहणारी माणसे जोडली गेली आहेत आणि त्यांच्याबरोबर संपर्क साधणे शक्य झाले आहे. मी तसे प्रयत्न करत होतो, पण ते नीट जुळवून आणण्यामधल्या काही तांत्रिक अडचणी दूर करून आवश्यक त्या सुखसोयी प्रस्थापित कराव्या लागतात. ते करेपर्यंत २०१६चे वर्ष बरेचसे संपत आले होते.

२०१७ मध्ये मात्र मला हवे असेल त्या वेळी ईमेल, फेसबुक आणि वॉट्सअॅप उपलब्ध होऊ लागले आणि मी त्यांचा पुरेपूर उपयोग करून घेतला. आमच्या ऑफिसमधून निवृत्त झालेल्या सहका-यांच्या गूगल ग्रुपमध्ये आता सुमारे तीनशे सदस्य आहेत, फेसबुकवर माझे सुमारे पाचशे मित्र आहेत आणि वॉट्सअॅपवरील आठ दहा ग्रुप्समध्ये मिळून पुन्हा तितकेच आहेत. यातले माझ्यासकट अनेक लोक झोपाळू सदस्य (स्लीपिंग मेंबर्स) असले तरी रोज निदान पंचवीस मेल्स, पन्नास अपडेट्स आणि शंभर तरी पोस्ट येतातच. त्यात मी सुध्दा अल्पशी भर टाकत असतो. मी लिहिण्याचा कंटाळा करत असलो आणि इधर का माल उधर करणे मला आवडत नसले तरी जमेल तेवढे वाचायचा निदान प्रयत्न तरी करतो. त्यामुळे शहाणपणात भर पडो न पडो, मेंदूतल्या पेशींना थोडा व्यायाम मिळत असावा.  शिवाय त्या निमित्याने त्या मित्राचे किंवा आप्ताचे नांव आणि फोटो दिसतो आणि त्याची आठवण जागी होते. त्याचे क्षेमकुशल आणि प्रगति समजते. यातून जरा चांगले वाटते.

२०१७ मध्ये आमच्या संकुलामधल्या कांही ज्येष्ठ नागरिकांनी एका संघाची स्थापना केली. तसे हे लोक रोजच सकाळ संध्याकाळ दोघातीघांच्या लहान लहान ग्रुप्समध्ये बसून गप्पा टप्पा करत असत. त्यांची संख्या कधी कधी सात आठ पर्यंत जात असे. त्याला आता जास्त जोम आला. या वर्षी मीसुध्दा त्यांच्यात जाऊन बसायला लागलो आणि त्यांच्यासोबत इकडे तिकडे जायला यायला लागलो. निरनिराळ्या गांवांमधून निरनिराळ्या प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करून आता इथे रहायला आलेल्या या ज्येष्ठ लोकांच्या जीवनातले अनुभव आणि त्यातून घडलेले त्यांचे व्यक्तिमत्व खूप वेगवेगळे असते. अणुशक्तीनगरमध्ये रहात असतांना आजूबाजूचे बहुतेक सगळे लोक ऑफिसात माझ्यासारखेच काम करणारे, माझ्याच शैक्षणिक, बौध्दिक व आर्थिक स्तरामधले आणि साधारणपणे समान विचारसरणीचे असायचे, त्यामुळे मला माणसांमधले इतके वैविध्य पहायला मिळत नव्हते. या वर्षी मी त्याचा अनुभव घेत आहे. आपलेच तेवढे खरे असे न समजता इतरांना हे जग कसे दिसते हे ऐकून घेण्यात एक वेगळी मजा येत आहे.   

. .  . . . . ... .  . . . . . . . . .  (क्रमशः)
--------------------------------------------------------------------------------------------------

Friday, December 22, 2017

वातावरणामधील हवेचा दाब


आपल्या आजूबाजूला चहूकडे हवा पसरलेली असते, पण ती संपूर्णपणे पारदर्शक असल्यामुळे आपल्या डोळ्यांना दिसत नाही. तिला रंग, गंध किंवा चंवसुध्दा नसते. त्यामुळे डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा या आपल्या बाह्य ज्ञानेंद्रियांना तिच्या अस्तित्वाचे ज्ञान होत नाही. पण या हवेला पंख्याने जरासे हलवलेले मात्र आपल्या त्वचेला लगेच समजते, हवेतले धूलिकण हलतांना दिसतात, हवेमधून गंध पसरतो आणि घ्राणेंद्रियांना तो लगेच समजतो, जोरात वारा आला तर त्याचा आवाज कानाला ऐकू येतो. श्वासोच्छ्वास करतांना किंवा फुंकर मारतांना तर आपल्याला हवेचे अस्तित्व जाणवते आणि ती श्वासाला कमी पडली तर लगेच आपला जीव कासावीस होतो. अशा प्रकारे ङवा आपल्या चांगल्या ओळखीची असते.

ही अदृष्य हवा वजनाने इतकी हलकी असते की वजनाच्या काट्यावर उभे राहून आपण दीर्घ श्वास घेतला आणि पूर्णपणे बाहेर सोडला तरी तो काटा तसूभरही जागचा हलत नाही. पण हवेलाही अत्यंत कमी असले तरी निश्चितपणे वजन असतेच. आपल्या वजनापेक्षाही जास्त भरेल इतके मोठे हवेचे ओझे आपण सतत आपल्या डोक्यावर आणि खांद्यावर वहात असतो आणि आपल्या अंगावर सतत सर्व बाजूंनी त्याचा दाब पडत असतो यावर मात्र कदाचित आपला विश्वास बसणार नाही.

जमीनीपाशी तर सगळीकडे हवा असतेच, या हवेत उंच उडणारे पक्षी आणि त्यांच्यापेक्षाही उंचावरील आभाळात वा-याबरोबर पुढे पुढे सरकणारे ढग दिसतात. आकाशात अमूक उंचीपर्यंत हवा पसरलेली आहे आणि तिच्यापुढे ती अजीबात नाही अशी स्पष्ट सीमारेषा नसते. जसजसे जमीनीपासून दूर जाऊ तसतशी ती अतीशय हळू हळू विरळ होत जाते. यामुळे ती आकाशात कुठपर्यंत पसरली आहे हे नजरेला दिसत नाही. मग जमीनीवरली हवा ढगांच्या पलीकडल्या अथांग आकाशात पार सूर्यचंद्र, ग्रहतारे यांच्यापर्यंत पसरलेली असते का? कदाचित नसेल असा विचार प्राचीन काळातल्या विचारवंतांच्या मनातसुध्दा आला असणार. कदाचित म्हणूनच या विश्वाची रचना ज्या पंचमहाभूतांमधून झाली आहे असे मानले जात होते त्यात पृथ्वी, आप (पाणी), तेज यांच्यासोबत वायू (हवा) आणि आकाश अशी दोन वेगळी तत्वे त्यांनी सांगितली होती.

सतराव्या शतकातले कांही पाश्चात्य संशोधक पाण्याच्या प्रवाहावर संशोधन करत होते. ते काम करतांना त्यांना हवेच्या दाबाचा शोध लागला अशी यातली एक गंमतच आहे. त्या काळातल्या युरोपमध्ये कांही शास्त्रज्ञांनी खोल विहिरींमधून पाणी उपसायचे पंप तयार केले होते, धातूंच्या नलिकांमधून (पाइपांमधून) पाणी इकडून तिकडे वाहून नेले जात होते आणि त्यात कांही जागी एकादा उंचवटा पार करून जाण्यासाठी वक्रनलिकेचा (सायफनचा) उपयोगसुध्दा केला जात होता. त्या काळात हवेचा दाब ही संकल्पनाच कुणालाही माहीत नव्हती आणि गुरुत्वाकर्षणाचे नियमही अजून सांगितले गेले नव्हते. हे पंप किंवा वक्रनलिका भौतिकशास्त्राच्या कोणत्या नियमांनुसार काम करत असतील याची  स्पष्ट कल्पना त्यांचा उपयोग करणा-यांनाही नव्हतीच. पण अनेक प्रयोग करून पाहतांना त्यातला एकादा सफल झाला, त्याचा उपयोग करून घेतला, त्या अनुभवावरून आणखी प्रयोग केले, त्यातला एकादा यशस्वी झाला किंवा त्या प्रयोगामधून योगायोगाने नवीन माहिती प्राप्त झाली, नवीन कल्पना सुचली अशा पध्दतीने हळू हळू माणसांच्या ज्ञानात वाढ होत होती, तसेच त्यांचे काम सोपे होत होते. विज्ञानाच्या क्षेत्रात त्या काळापर्यंत झालेली बरीचशी प्रगति अशा प्रकारे झाली होती.
   
पाणी उपसण्याच्या पंपांवर काम करत असलेल्या काही शास्त्रज्ञांना असा अनुभव आला की सुमारे दहा मीटर खोल विहिरींमधले पाणी  कितीही जोर लावला तरी कांही केल्या वरपर्यंत येऊन पोचतच नाही. तसेच दहा मीटर उंचवटा पार करून जाणा-या वक्रनलिकेमधून पाणी वहात पुढे जातच नाही. अशा प्रकारच्या तांत्रिक तक्रारी त्या काळातले श्रेष्ठ इटॅलियन शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्याकडे आल्या. त्यांनाही लगेच या कोड्याचे उत्तर मिळाले नाही, पण इव्हाँजेलिस्ता तॉरिचेली (Evangelista Torricelli (Italian: [evandʒeˈlista torriˈtʃɛlli]) या नावाचे त्यांचे एक हुषार सहकारी होते त्यांनी मात्र या अनुभवांवर खोलवर विचार करून त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला.


आपण हाताने एकादी दोरी धरून ओढू शकतो तसे पाण्याला आपल्याकडे ओढता येत नाही. मग पंपाने तरी ते नळीमधून वरच्या बाजूला कां खेचले जावे असा प्रश्न तॉरिचेलीला पडला. पाण्याला ओढून वर काढणे शक्य नसेल तर कोणीतरी त्याला खालून वर ढकलत असले पाहिजे असा सयुक्तिक तर्क त्याने केला. तॉरिचेलीच्या काळातलाच पास्कल नावाच्या फ्रेंच शास्त्रज्ञ द्रवरूप किंवा वायुरूप अशा प्रवाही पदार्थांमधील (फ्लुइड्समधील) दाब या विषयावर संशोधन करीत होता. विहिरीच्या पाण्यावर जी हवा असते ती हवा जर तिच्या वजनाइतका दाब पाण्यावर देत असली तर त्यामुळे पाण्यामध्ये सर्व दिशांनी दाब निर्माण होईल आणि त्यात बुचकळलेल्या नळीमधले पाणी त्या दाबामुळे वर उचलले जाईल असा रास्त विचार तॉरिचेलीने केला. पाणी उचलले जाण्याला दहा मीटर्सची मर्यादा कशामुळे येत असेल हा जो मूळ प्रश्न होता, त्याचे कारण हवेचा पाण्यावरला दाब फक्त इतकाच मर्यादित असेल असे उत्तर त्याला मिळाले.  पण त्याला सुचलेल्या या विचाराची खातरजमा करून घेणे अत्यंत आवश्यक होते.

तॉरिचेलीने एक लांबलचक सरळ नळी घेऊन ती पाण्याने पूर्णपणे भरली आणि तिला दोन्ही बाजूंनी झाकणे लावून बंद केली, एका लहानशा उघड्या टाकीत पाणी भरून त्या नळीला त्यात उभे केले आणि हळूच त्या नळीच्या तळातले झाकण उघडले. त्यासरशी त्या नळीमधले थोडे पाणी खाली असलेल्या टाकीमध्ये उतरलेले दिसले पण बाकीचे पाणी उभ्या नळीतच राहिले. नळीमध्ये उरलेल्या पाण्याच्या स्तंभाची उंची सुमारे दहा मीटर्स भरली. यावरून त्याने असा निष्कर्ष काढला की दहा मीटर उंच पाण्याचा स्तंभ खालच्या टाकीमधल्या पाण्यावर जेवढा दाब देईल तेवढाच हवेचा दाब पाण्यावर पडत असला पाहिजे. पण दहा बारा मीटर इतकी लांब नळी त्याच्या घरात मावत नसल्यामुळे ती छपराच्या वर जात होती आणि वातावरणातल्या हवेचा दाब कमी जास्त होत असल्यामुळे तिच्यातले पाणी खाली वर होतांना दिसत होते. हा माणूस कांही जादूटोणा चेटुक वगैरे करत असल्याची शंका त्याच्या शेजा-यांना आली. त्यामुळे त्याने हा प्रयोग थांबवला.

हवेच्या दाबाच्या अस्तित्वाबद्दल तॉरिचेलीची खात्री पटली होती. आपण सगळेजण हवेने भरलेल्या एका विशाल महासागराच्या तळाशी रहात आहोत असे त्याने एका पत्रात लिहून ठेवले होते. समुद्राच्या तळाशी गेल्यावर जसा पाण्याचा प्रचंड दाब शरीरावर पडतो तसाच हवेचा दाब आपल्यावर सतत पडत असतो असे त्याने सांगितले. त्या काळातल्या इतर शास्त्रज्ञांना ती अफलातून कल्पना पटायची नाही. आपले सांगणे प्रात्यक्षिकामधून सिध्द करून दाखवण्यासाठी तॉरिचेलीने एक वेगळा प्रयोग केला. त्याने पाण्याच्या तेरापट जड असलेला पारा हा द्रव एक मीटर लांब कांचेच्या नळीत भरून ती नळी पारा भरलेल्या पात्रात उभी करून धरली. त्याच्या अपेक्षेप्रमाणे नळीमधला पारा खाली येऊन सुमारे पाऊण मीटर (७६ सेंटीमीटर) उंचीवर स्थिरावला. पाऊण मीटर पा-याच्या स्तंभाचे वजन दहा मीटर पाण्याच्या स्तंभाइतकेच असते.  तॉरिचेलीने तयार केलेला हा जगातला पहिला वायुभारमापक (बॅरोमीटर) होता. नळीमधला पा-याच्या वर असलेला भाग पूर्णपणे रिकामा होता, बाहेरची हवा तिथे जाण्याची शक्यता नव्हती. अशी निर्वात पोकळी (व्हॅक्यूम) हा सुध्दा त्या काळात एक नवा शोध होता. अशी पोकळी असू शकते याची कोणी कल्पना करू शकत नव्हता. तत्कालिन शास्त्रज्ञांना ते सत्य पटवून देण्याठी पास्कल या फ्रेंच शास्त्रज्ञाला बरेच प्रयोग आणि प्रयत्न करावे लागले. पृथ्वीवर तॉरिचेलीने त्याच्या बॅरोमीटरमध्ये निर्वात पोकळी निर्माण केली होती या गोष्टीची आठवण ठेऊन निर्वात पोकळीमधील दाबाचे मोजमाप करण्यासाठी तॉरिचेलीच्या सन्मानार्थ टॉर हे युनिट धरले जाते.

समुद्रसपाटीवर प्रत्येक एक वर्ग सेंटिमीटर इतक्या लहानशा क्षेत्रफळावर उभ्या असलेल्या कांही किलोमीटर उंच अशा हवेच्या स्तंभाचे सरासरी वजन सुमारे एक किलोग्रॅम (1.01 Kg/sq.cm) इतके असते. म्हणजेच सुमारे ७६ सेंटीमीटर पारा किंवा १० मीटर पाणी यांना तोलून धरण्यासाठी १०१ किलोपास्कल 101 kN/m2 (kPa) म्हणजेच 10.1 N/cm2 इतका  हवेचा दाब लागतो असे गणितातून सिध्द होते. जर्मनीमधील मॅग्डेबर्ग या शहराचा नगराध्यक्ष असलेल्या ओटो व्हॉन गेरिक या शास्त्रज्ञाने हवेचा दाब किती शक्तीशाली असतो आणि त्याने तयार केलेला व्हॅक्यूम पंप किती चांगले काम करतो हे प्रत्यक्ष प्रमाणाने दाखवण्यासाठी एक अजब प्रयोग केला. त्याने तांब्याचे दोन मोठे अर्धगोल तयार करून त्यांना एकमेकांमध्ये बसवले आणि त्यांना फक्त ग्रीज लावून सील केले. त्यानंतर त्या गोलाकार डब्यामधली शक्य तितकी हवा व्हॅक्यूम पंपाद्वारे बाहेर काढून टाकली. बाहेरील वातावरणामधल्या हवेच्या दाबामुळे ते अर्धगोल इतके घट्ट बसले की दोन्ही बाजूला जुंपलेल्या अनेक घोड्यांनी ओढूनसुध्दा ते एकमेकापासून वेगळे झाले नाहीत. त्या अर्धगोलांना लावलेली झडप उघडताच बाहेरील हवा आत शिरली आणि ते सहजपणे वेगळे झाले. हे अर्धगोल आणि हा प्रयोग मॅगेडेबर्गच्या नावानेच प्रसिध्द आहे.

आपल्या शरीरावरसुध्दा बाहेरच्या हवेचा इतका मोठा हवेचा दाब पडत असतोच, पण ज्या प्रमाणे पाण्यात बुडवलेल्या वस्तूला पाणी उचलून धरत असते असे आर्किमिडीजने सांगितले होते त्याप्रमाणे हवासुध्दा आपल्याला वर उचलतही असते. शरीराच्या अंतर्गत भागांमधल्या पोकळ्यांमधली हवा बाह्य वातावरणाशी संलग्न असल्यामुळे शरीराच्या आतल्या इंद्रियांमध्ये सुध्दा तेवढाच दाब असतो. तो आपल्या इंद्रियांना आणि कातडीला आतून बाहेर ढकलत असतो. यामुळे आपल्याला वातावरणातल्या हवेचा दाब एरवी जाणवत नाही. पण विमानात किंवा कांही प्रयोगशाळांमध्ये हवेच्या दाबाचे मुद्दाम नियंत्रण केले जाते. तिथे आपल्या कानाच्या पडद्यांना तो फरक लगेच जाणवतो.

पुढील काळात निरनिराळ्या संशोधकांनी हवेचा दाब मोजण्यासाठी पा-याच्या वायुभारमापकाशिवाय इतर प्रकारची अनेक सोयिस्कर उपकरणे तयार केली आणि निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या जागी हवेचा दाब मोजून पाहिला. वातावरणाचा अभ्यास करण्याचे ते एक मुख्य साधन झाले. समुद्रसपाटीला हवेचा सर्वात जास्त दाब असतो आणि जसजसे आपण उंचावर जाऊ तसतसे त्या ठिकाणाच्या वर असलेल्या हवेचा थर पातळ होत जातो आणि त्या जागी वातावरणामधील हवेचा दाब कमी कमी होत जातो. हिमालयातल्या उंच पर्वतशिखरांवर तो खूपच कमी असतो. तिथे जाणा-या गिर्यारोहकांना श्वास घेतांना पुरेशी हवा न मिळाल्यामुळे धाप लागते. त्यांना हवेचा विरळपणा प्रत्यक्षात जाणवत होताच. तिथल्या हवेचा दाब मोजून तो किती कमी आहे हे पहाण्याचे एक साधन मिळाले. समुद्रसपाटीपासून पर्वतशिखरापर्यंत कुठल्याही ठिकाणच्या हवेचा दाब नेहमीच स्थिरसुध्दा नसतो. तिथल्या तपमानात होत असलेल्या बदलांमुळे हवा आकुंचन किंवा प्रसरण पावते आणि त्यातून तिथल्या हवेचा दाब कमी जास्त होत असतो. त्यामुळे ज्या ठिकाणी हवेचा दाब जास्त असेल तिथली हवा कमी दाब असलेल्या भागाकडे वाहू लागते. याचा सखोल अभ्यास केल्यावर वारे नेहमी ठराविक दिशेने कां वाहतात हे समजले. हवेच्या दाबाच्या अभ्यासावरूनच वादळांची पूर्वसूचना मिळू लागली.

मोटारींच्या किंवा कारखान्यातल्या स्वयंचलित इंजिनांना हवेची आवश्यकता असते, तसेच विमान हवेने उचलून धरल्यामुळेच हवेत उडते. हवेला दाब असतो हे सिध्द झाल्यानंतर आणि तो मोजण्याची साधने उपलब्ध झाल्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानाची अनेक नवी दालने उघडली.


Tuesday, December 05, 2017

गॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स)



ज्ञान, विज्ञान, शास्त्र या संस्कृत भाषेमधील प्राचीन शब्दांना कालमानानुसार वेगवेगळे अर्थ जोडले गेले. मी शाळेत शिकत असतांना शास्त्र या नावाच्या विषयामध्ये सायन्स शिकलो होतो. आता विज्ञान हा शब्द अधिक प्रचलित झाला आहे. तरी संशोधन करणा-या सायंटिस्ट लोकांना शास्त्रज्ञ असेच संबोधले जाते. मुळात सायन्स आणि सायंटिस्ट हे शब्दसुध्दा अलीकडच्या काळातलेच म्हणजे गेल्या दोन तीनशे वर्षात पुढे आलेले आहेत. आपण आज ज्यांचा समावेश सायन्समध्ये करतो त्या विषयांचा समावेश युरोपमध्ये नॅचरल फिलॉसॉफीमध्ये केला जात होता आणि तो फिलॉसॉफीचा एक भाग होता. निरनिराळे विद्वान विचारवंत त्यांच्या बुध्दीमत्तेनुसार विचार करून अनेक विषयांवर आपली मते किंवा सिध्दांत मांडत असत आणि ती भिन्न किंवा परस्परविरोधी असली तरी त्या त्या विद्वानांचे अनुयायी त्यांचा डोळे मिटून स्वीकार करून त्यांना पुढे नेत असत आणि ज्याच्या नावाचा दबदबा जास्त त्याच्या सांगण्याला मान्यता मिळत असे. फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञानामध्ये हे चालत आले आहे, पण सायन्समध्ये तसे चालत नाही. यामुळे सायन्सची फिलॉसॉफीपासून फारकत करण्यात आली. इंग्रजी शिक्षणपध्दतीमधून जेंव्हा आपल्याकडे सायन्सचे शिक्षण सुरू झाले तेंव्हा त्याला शास्त्र किंवा विज्ञान अशी नावे दिली गेली, पण तो नेमका अर्थ अजूनही लोकांच्या मनात पूर्णपणे रुजलेला नाही. त्यामुळे अमूक तमूक गोष्ट शास्त्रीय आहे की नाही यावर अनेक वादविवाद होत असतात. या लेखामध्ये मी विज्ञान हा शब्द फक्त सायन्स याच अर्थाने घेतला आहे. 

विज्ञान (सायन्स) म्हणजे थोडक्यात सांगायचे झाल्यास आपले जग कसे चालते याचा पध्दतशीर अभ्यास आणि त्यातून समजलेले निसर्गाचे नियम व सिध्दांत मुद्देसूदपणे मांडणे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि त्यांच्यापासून निघालेल्या उपशाखांचा समावेश विज्ञानात केला जातो. या विषयातले सिध्दांत प्रत्यक्ष प्रमाणाने सिध्द केले जातात. याचा पाया घालण्यात गॅलीलिओचा मोठा वाटा आहे.

प्राचीन काळातले ऋषीमुनि आणि विद्वानांनी अनेक शास्त्रांचा विकास केला होता. मंत्रतंत्र, स्तोत्रे, कथा, पुराणे, वगैरें धर्मशास्त्रे पिढी दर पिढी पुढे दिली जात गेली. योगविद्या, आयुर्वेद, ज्योतिष वगैरे कांही शास्त्रेही टिकून राहिली. पण विज्ञानाशी संबंधित शास्त्रांना बहुधा प्राधान्य दिले जात नसावे. आर्यभट, वराहमिहिर आदि विद्वानांनी भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, गणित वगैरे विषयांवर काम केले होते. पण त्यांचे सिध्दांत आणि सूत्रे यांचा प्रसार मधल्या काळात थांबला. शास्त्रज्ञांची मालिका तयार झाली नाही. मध्ययुगाच्या काळात त्यांच्या संस्कृत ग्रंथांवर मराठी किंवा हिंदीसारख्या भाषेतही भाष्य किंवा लेखन झालेले दिसत नाही.

युरोपमध्ये पूर्वीच्या काळात ज्ञानाचा प्रसार करण्याचे काम मुख्यतः धर्मगुरूंकडेच होते. तेंव्हा विज्ञानाचा समावेश तत्वज्ञानात केला जात होता. तिकडल्या कांही ठिकाणी विद्यापीठांची स्थापना झाली होती आणि तिथे विविध विषयांवरील पुरातन ग्रंथांचा आणि इतर शास्त्रांसोबत खगोलशास्त्र व गणितासारख्या विषयांचासुध्दा अभ्यास केला जात असे. अॅरिस्टॉटल, टॉलेमी, युक्लिड, पायथॉगोरस, आर्किमिडीस आदि विद्वानांनी सांगितलेली प्रमेये, सिध्दांत, नियम वगैरे त्यांच्या नावानिशी जतन करून ठेवले गेले होते आणि त्यामध्ये रस असलेल्या विद्यांर्थ्यांना ते शिकणे शक्य होते.

गॅलीलिओ गॅलीली या इटालियन शास्त्रज्ञाने विज्ञानामधल्या निरनिराळ्या विषयांवर संशोधन केले, त्यासाठी अनेक प्रकारचे प्रयोग आणि प्रात्यक्षिके केली, त्यामधून केलेल्या निरीक्षणांचा तर्कसंगत अर्थ लावून त्यामधून निष्कर्ष काढले आणि ते सुसंगतपणे जगापुढे मांडले. यालाच शास्त्रीय पध्दत (सायंटिफिक मेथड) असे म्हणतात आणि पुढील काळातले संशोधन कार्य त्या पध्दतीने होऊ लागले. म्हणून गॅलीलिओला आधुनिक विज्ञानाचा जनक समजले जाते.

गॅलीलिओचा जन्म १५६४ साली इटलीमधल्या सुप्रसिध्द पिसा या गावात झाला. त्याचे वडील एक संगीतज्ञ होते. कुशाग्र गॅलीलिओने लहानपणी संगीत आणि त्यातले गणित आत्मसात केले. त्या काळातही डॉक्टरांची कमाई चांगली होत असे म्हणून त्याला वैद्यकीय शास्त्राच्या शिक्षणासाठी विद्यापीठात पाठवले होते. पण त्याचा ओढा विज्ञानाकडे असल्यामुळे त्याने औषधोपचाराऐवजी गणित आणि नैसर्गिक तत्वज्ञान या विषयांचा अभ्यास करून त्यात प्राविण्य मिळवले.

मेडिकलचा अभ्यास करत असतांनाच त्याचे लक्ष चर्चमध्ये टांगलेल्या झुंबरांकडे गेले. ती झुंबरे वा-याने कमी जास्त झुलत होती, पण त्यांना जोराने ढकलले किंवा हळूच लहानसा झोका दिला तरी त्यांची आंदोलने तेवढ्याच वेळात होतात असे त्याला वाटले आणि त्याने आपल्या नाडीच्या ठोक्यांच्या आधारे ते झोके मोजले. त्याने घरी येऊन दोन एकसारखे लंबक तयार करून टांगले. त्यातल्या एकाला जास्त आणि दुस-याला कमी खेचून सोडले तरी दोन्ही लंबक एकाच लयीमध्ये झुलत राहिले. त्यानंतर त्याने तपमान मोजणे, वजन करणे वगैरे कामे करणारी उपकरणे तयार केली आणि तत्कालिन शास्त्रज्ञांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले.

गॅलीलिओने एकापेक्षा एक अधिक शक्तीशाली दुर्बिणी तयार केल्या आणि त्या दुर्बिणींमधून आकाशाचे खूप बारकाईने निरीक्षण केले. चंद्राला असतात तशाच शुक्रालासुध्दा कला असतात हे त्याने पाहिले. त्याने शनी ग्रहाच्या सभोवती असलेली कडी पाहिली, शनी ग्रहाच्या पलीकडे असलेल्या नेपच्यूनलाही पाहिले, पण तो सूर्याभोवती अत्यंत मंद गतीने फिरणारा ग्रह न वाटता एकादा अंधुक तारा आहे असे वाटले. गुरु या ग्रहाला प्रदक्षिणा घालणारे चार लहानसे ठिपके पाहून त्याने ते गुरूचे उपग्रह असल्याचे अनुमान केले. त्यापूर्वी शास्त्रज्ञांना फक्त तारे आणि ग्रह माहीत होते, उपग्रह ही संकल्पनाच नव्हती. पृथ्वीलाच ग्रह मानले जात नसतांना चंद्र हा फक्त चंद्रच होता. गॅलीलिओने सूर्यावरचे डाग आणि चंद्रावरचे डोंगर व खळगे पाहिले. धूसर दिसणारी आकाशगंगा असंख्य ता-यांनी भरलेली आहे असे सांगितले. ग्रह आणि तारे यांचे ढोबळपणे आकार मोजण्याचा प्रयत्न केला. आकाशातले सगळे तारे एकाच प्रचंड गोलाला चिकटले आहेत असे अॅरिस्टॉटलने वर्तवले होते आणि मानले जात होते. ते निरनिराळ्या अंतरावर असल्याचे गॅलीलिओने निरीक्षणांवरून सिध्द करून दाखवले.

गॅलीलिओला खगोलशास्त्राची खूप आवड होती आणि त्याने गणितातही प्राविण्य मिळवले होते. त्याने कोपरनिकस आणि केपलर यांनी केलेल्या संशोधनाचा आणि किचकट आकडेमोडीचा अभ्यास केला. त्यांनी मांडलेली सूर्यमालिकेची कल्पना गॅलीलिओला पटली आणि त्याने ती उचलून धरली. सूर्य एका जागी स्थिर असून पृथ्वी त्याच्याभोवती फिरते हे मत बायबलमधल्या काही ओळींच्या विरोधात जात होते. धर्मगुरूंनी ते खपवून घेतले नाही आणि गॅलीलिओने या विषयावरचे काम ताबडतोब थांबवावे असा आदेश दिला. त्याने तो आदेश पाळला आणि आपले मत बदलले नसले तरी ते उघडपणे मांडणे टाळले. तरीही सोळा वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच्यावर खटला भरून त्याला नास्तिकपणाच्या विचारांचा प्रसार करण्याच्या गुन्ह्यासाठी आजन्म स्थानबध्दतेची शिक्षा फर्मावली गेली.

भौतिकशास्त्र आणि अभियांत्रिकी या विषयांमध्येसुध्दा गॅलीलिओने मोलाची भर घातली. उंचावरून खाली पडत असलेल्या वस्तूंच्या गतीच्यासंबंधी त्याने केलेल्या निरीक्षणांचा आणि मांडलेल्या विचारांचा पुढे न्यूटनला उपयोग झाला. गॅलीलिओने ध्वनींची कंपनसंख्या आणि प्रकाशाचा वेग मोजण्याचे प्रयत्न केले. भूमिती आणि निरीक्षणासाठी लागणा-या कंपॉसपासून ते दुर्बिण आणि सूक्ष्मदर्शक यंत्रापर्यंत अनेक प्रकारची उपकरणे गॅलीलिओने तयार केली, बाजारात विकली आणि संशोधनासाठी स्वतः वापरली.

या सर्वांपेक्षा अधिक मोलाची गोष्ट म्हणजे त्याने जगाला एक वैज्ञानिक दृष्टी दिली. त्याने प्रयोग, प्रात्यक्षिक आणि गणित यांची सांगड घालून कुठलाही तर्कशुध्द निष्कर्ष काढणे किंवा तपासून पाहणे आणि तो रूढ समजुतींना धक्का देणारा असला तरीही निर्भीडपणे आणि सुसंगतपणे मांडणे याची एक  वैज्ञानिक चौकट घालून दिली. विज्ञान किंवा सायन्स आणि सायंटिफिक मेथड या शब्दांचा उपयोग गॅलीलिओच्या काळात होत नव्हता, ते रूढ व्हायला आणखी शंभर दीडशे वर्षे लागली असली तरी त्या विचारांना आधी गॅलीलिओने दिली. त्यामुळे त्याला आधुनिक विज्ञानाचा जनक ही सार्थ पदवी दिली गेली.


Tuesday, November 14, 2017

कोपरनिकसचे संशोधन - सूर्यमालिका



सूर्यास्त होऊन काळोख पडल्यानंतर लक्षावधी चांदण्या आकाशात लुकलुकतांना दिसायला लागतात. सूर्यास्तानंतर पूर्व दिशेच्या क्षितिजापाशी चमकणा-या चांदण्या पहाट होईपर्यंत पश्चिमेच्या क्षितिजापाशी जाऊन पोचलेल्या असतात आणि रात्रीच्या सुरुवातीला आभाळभर पसरलेल्या बहुतेक चांदण्या पहाट होईपर्यंत अस्ताला जाऊन त्यांच्या जागी वेगळ्याच चांदण्या आलेल्या असतात. ध्रुवतारा मात्र आपल्या जागी स्थिर असतो आणि सप्तर्षी, शर्मिष्ठा वगैरे कांही तारकापुंज  त्याच्या आसपास दिसतात. गच्चीवर झोपणारा माणूस अंथरुणात पडल्या पडल्या एवढ्या गोष्टी पाहू शकतो. पण प्राचीन काळातील अनेक ऋषीमुनींनी वर्षानुवर्षे खर्ची घालून आकाशातल्या अगणित तारकांचे खूप बारकाईने निरीक्षण केले आणि त्यांचा सूक्ष्म अभ्यास केला. मेष, वृषभ, मिथुन आदि बारा राशी आणि अश्विनि, भरणी यासारखी सत्तावीस नक्षत्रे यांची योजना करून त्यांनी संपूर्ण आकाशगोलाचा एक प्रकारचा नकाशा तयार केला.

प्रत्येक राशी किंवा नक्षत्रामधली प्रत्येक चांदणी नेहमीच तिच्या स्थानावरच दिसते. पण मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनि हे पांच ग्रह मात्र आपापल्या गतीने स्वतंत्रपणे फिरतांना दिसतात. प्राचीन भारतीयांनी सूर्य आणि चंद्र यांची गणनासुध्दा ग्रहांमध्येच केली होती. त्यांनी सूर्य आणि चंद्र यांना अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान दिले आणि राहू व केतु या नांवाचे दोन अदृष्य ग्रह धरून नवग्रह बनवले. आज रात्री जे ग्रह ज्या राशींमधल्या तारकांच्या सोबत दिसतात त्यांच्याच सोबत ते पुढच्या महिन्यात किंवा वर्षी दिसणार नाहीत. चंद्र तर रोजच सुमारे पाऊण तास उशीराने उगवतो आणि मावळतो आणि वेगळ्याच नक्षत्रासोबत असतो. सूर्याच्या प्रखर प्रकाशापुढे आकाशातल्या मिणमिणत्या चांदण्या दिवसा दिसत नाहीत, पण सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेच्या क्षितिजावर किंवा सूर्यास्ताच्या नंतर पश्चिमेला ज्या राशी दिसतात त्यावरून सूर्य कोणत्या राशीसोबत आहे याचा अंदाज करता येतो. तो सुमारे ३०-३१ दिवसांमध्ये रास बदलत असतो आणि वर्षभरात सगळ्या बारा राशींमधून फिरून पुन्हा पहिल्या राशीत परत येतो. हे चक्र विश्वाच्या निर्मितीपासून अव्याहत चालत आले आहे.

प्राचीन काळातल्या विद्वानांनी राशी आणि नक्षत्रांच्या संदर्भात सूर्य, चंद्र आणि या पाच ग्रहांच्या भ्रमणाचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून त्यातल्या प्रत्येकाच्या गतींसंबंधी अचूक माहिती गोळा केली. त्या सर्वांच्या गति समान नसतातच, शिवाय त्या बदलत असतात. काही ग्रह मधूनच घूम जाव करून थोडे दिवस मागे मागे सरकतांना दिसतात. या चलनाला त्यांचे वक्री होणे असे नाव दिले गेले. पूर्वी आकाशातल्या ग्रहांची गणना स्वर्गातल्या देवतांमध्ये होत होती. ते सतत पृथ्वीवर लक्ष ठेऊन असतात आणि त्यांची कृपा किंवा अवकृपा झाल्यामुळे आपल्या आयुष्यात निरनिराळ्या चांगल्या किंवा वाईट घटना घडत असतात असा लोकांचा ठाम विश्वास होता. असे हे शक्तीशाली ग्रह त्यांना वाटले तर हळू चालतील नाही तर जलद, कधी वक्री होतील आणि कधी मार्गी लागत असतील. त्यावर जास्त चिकित्सा करायचे धाडस होत नसेल आणि कोणी तसे प्रयत्न केले असलेच तरी कदाचित ते संशोधन काळाच्या ओघात नष्ट होऊन गेले असेल. प्राचीन काळात खगोलशास्त्राचा विकास ग्रहता-यांच्या सूक्ष्म निरीक्षणापर्यंत झाला होता, पण त्या निरीक्षणांची चिकित्सा करण्याचा फारसा प्रयत्न झाला नसावा. त्यापुढचा प्रवास ग्रहता-यांच्या स्थानांवरून शुभ अशुभ काळ ठरवणे, भविष्य वर्तवणे या दिशेने होत गेला.

ग्रीक मायथॉलॉजीमध्ये सुध्दा सूर्य, चंद्र आणि ग्रहांना देव किंवा देवी मानले गेले होते, पण ख्रिश्चन धर्माच्या प्रसारानंतर त्यांचे देवपण नाहीसे झाले. त्या धर्माच्या शिकवणीनुसार ईश्वराने हे सारे विश्व पृथ्वीवरील मनुष्यप्राण्यासाठी निर्माण केले असल्यामुळे सर्व तारे आणि ग्रह पृथ्वीभोवती फिरतात याबद्दल कोणाच्या मनात शंका नव्हती. साध्या नजरेला तसेच दिसते, टॉलेमीसारख्या प्रकांडपंडितांनी शेकडो वर्षांपूर्वी तसे लिहून ठेवले होते आणि शेकडो वर्षे तसे मानले जात होते.


आकाशातसुध्दा सगळेच काही दिसते तसे नसते असे काही जुन्या विद्वान शास्त्रज्ञांनाही वाटले होतेच. "ज्याप्रमाणे अनुलोमगतीने जाणारा आणि नावेत बसलेला मनुष्य अचल असा किनारा विलोम जातांना पाहतो, त्याप्रमाणे लंकेमध्ये  अचल असे तारे पश्चिम दिशेस जातांना दिसतात." असे आर्यभटीयामधल्या एका श्लोकात लिहिले आहे. आर्यभटाला स्वतःला ही कल्पना सुचली असेल किंवा कदाचित त्यापूर्वीच कुणीतरी मांडलेले मत त्याने वाचले किंवा ऐकले असेल. पण "प्रवह वायूकडून सतत ढकलला जाणारा सग्रह (ग्रहांसहित असा) भपंजर (तार्‍यांचे जाळे अथवा पिंजरा) (पूर्वेकडून) पश्चिमेकडे वाहून नेला जातो (किंवा तसा भास होतो)." असेही आर्यभटाने पुढच्या श्लोकात लिहिले आहे. "उदोअस्तुचे नि प्रमाणे...जैसे न चालता सूर्याचे चालणे..." असे एक उदाहरण ज्ञानेश्वरांनी दिले आहे. अशी आणखी उदाहरणेही असतील.  प्राचीन काळातल्या लेखनांमध्ये अशा प्रकारचे काही सूचक उल्लेख मिळतात, पण त्यात पृथ्वी हा शब्द आलेला नाही किंवा तिच्या स्वतःभोवती फिरण्याबद्दल स्पष्ट विधान दिसत नाही. पृथ्वीच्या गिरकी घेण्यामुळे दिवस आणि रात्र होतात असे पूर्वीच्या काळी मानले जात असल्याचे दिसत नाही. जी विधाने मिळतात ती कशाच्या आधारावर केली गेली असतील याचा खुलासाही मिळत नाही. या शास्त्रज्ञ आणि विद्वानांचे या बाबतीतले शास्त्रीय ज्ञान परंपरागत पध्दतींमधून आपल्यापर्यंत येऊन पोचले नाही.

सोळाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात पोलंड या देशात निकोलाय कोपरनिकस नावाचा एक विद्वान माणूस चर्चमध्ये सेवा करत होता. तो अत्यंत बुध्दीमान, अभ्यासू आणि चिकित्सक वृत्तीचा होता. त्याने इतर काही शास्त्रांबरोबर खगोलशास्त्राचाही छंद जोपासला होता आणि उपलब्ध ग्रंथांचा अभ्यास केला होता. पण प्रत्यक्ष केलेल्या निरीक्षणामधून त्याच्या चाणाक्ष नजरेला काही वेगळे दिसल्यामुळे त्यातल्या कांही गोष्टींबद्दल त्याच्या मनात शंका निर्माण झाल्या.

पोलंडसारख्या उत्तरेकडल्या देशात ध्रुवाचा तारा क्षितिजापासून बराच उंचावर दिसतो आणि सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. डिसेंबरच्या अखेरीला तर तो उगवल्यावर तिरकस रेषेत थोडा वर येतो आणि तसाच तिरका खाली उतरत लवकरच अस्ताला जातो. त्यानंतर सतरा अठरा तासाच्या रात्रीमध्ये उगवून मावळणा-या अनेक तारकांचे आकाशातले मार्ग निरखून पहायला मिळतात. कोपरनिकसने असे पाहिले की हे ग्रह तारे पूर्वेकडून सरळ पश्चिमेकडे जात नाहीत. ध्रुव ता-याला केंद्रस्थानी ठेऊन मोठमोठी काल्पनिक वर्तुळे काढली तर सर्व तारे अशा वर्तुळाकार वाटांवरून मार्गक्रमण करत असतात असे त्याच्यातल्या गणितज्ञाच्या लक्षात आले. म्हणजेच हे सगळे तेजस्वी तारे एका लहानशा ध्रुवाभोंवती फिरतांना दिसतात. (आकृती १ पहा)


कोपरनिकसला हे जरा विचित्र वाटले. आपण स्वतःभोवती गिरकी घेतो तेंव्हा आपल्या आजूबाजूच्या स्थिर असलेल्या वस्तू आपल्याभोवती फिरत आहेत असे आपल्याला वाटते. त्याचप्रमाणे कदाचित हे तारे आपापल्या जागेवरच स्थिर रहात असतील आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरत असली तर पृथ्वीवरून पहातांना आपल्याला मात्र ते तारे आकाशातून फिरतांना दिसत असतील असे होणे शक्य होते. अशाच प्रकारे स्वतःभोवती फिरत असतांना पृथ्वीचा जो अर्धा भाग सूर्याच्या समोर येत असेल तिथे दिवसाचा उजेड पडेल आणि उरलेला अर्धा भाग अंधारात असल्यामुळे तिथे रात्र असेल. (आकृति २)


कोपरनिकसला हा विचार पूर्णपणे पटला आणि त्याने तो ठामपणे मांडून गणितामधून सिध्द करून दाखवला. भारतीय किंवा युरोपमधील इतर विद्वानांनी त्याच्या आधी तसे केलेही असले तरी ते सिध्दांत आता उपलब्ध नाहीत. कोपरनिकसने एवढ्यावर न थांबता पुढे जे संशोधन केले ते अत्यंत क्रांतिकारक होते. खरे तर त्यामुळेच त्याचे नांव अजरामर झाले.

कोपरनिकसने मांडलेल्या विचाराप्रमाणे आकाशातले असंख्य तारे आपापल्या जागी स्थिर आहेत असे मानले तरी सूर्य, चंद्र आणि इतर ग्रह तर तसे स्थिर दिसत नाहीत. ते एकेका राशीमधून पुढच्या राशीमध्ये जातांना दिसतातच. कोपरनिकस मुख्यतः त्यांच्या भ्रमणावर सखोल संशोधन करत होता. ते केंव्हा उगवतात किंवा मावळतात, कोणच्या राशीत किती अंशांवर दिसतात वगैरे या गोलकांच्या भ्रमणासंबंधी जेवढी माहिती मिळाली ती त्याने पिंजून काढली, वर्षानुवर्षे स्वतः निरीक्षणे करून ती पडताळून घेतली, त्यात नवी भर घातली आणि ती सगळी आंकडेवारी गणितामधून सुसंगतपणे मांडायचा प्रयत्न केला. पण त्यात अडचणी येत होत्या. सूर्यनारायण राशीचक्रामधून जवळजवळ समान वेगाने फिरतो. बुध हा ग्रह नेहमी सूर्याच्या मागे किंवा पुढे पण अगदी जवळ दिसतो आणि शुक्र हा ग्रह सुध्दा थोडा दूर जात असला तरी सूर्याच्या आगेमागेच असतो. हे दोन ग्रह एक तर पहाटे पूर्व दिशेला सूर्याच्या आधी उगवतात किंवा संध्याकाळी पश्चिम दिशेला काही वेळ चमकून मावळून जातात. ते कधीही मध्यरात्रीच्या वेळी आकाशात नसतात आणि कधीही डोक्यावर आलेले दिसत नाहीत. गुरु आणि शनि हे ग्रह अत्यंत संथ गतीने राशीचक्रामधून फिरत एक परिभ्रमण अनुक्रमे १२ आणि ३० वर्षांमध्ये पूर्ण करतात. मंगळ हा ग्रह बराच अनियमित दिसतो, तो कधी खूप तेजस्वी असतो तर कधी मंद वाटतो, कधी वेगाने पुढे सरकतो तर कधी वक्री होऊन मागे मागे सरकतो.

ग्रहांच्या बाबतीतली ही अनियमितता कोपरनिकसला आवडली नाही. ईश्वराने निर्माण केलेले हे अवघे विश्व अगदी निर्दोषच (पर्फेक्ट) असणार असा त्याचा विश्वास होता. पृथ्वीवरून आपल्याला हे ग्रह असे वेगाने किंवा सावकाश आणि वक्री किंवा मार्गी दिशांना फिरतांना दिसत असले तरी प्रत्यक्षात ते तसे नसू शकेल या विचाराने त्याला घेरले. त्याच्या आधी काही शास्त्रज्ञांनी हेलिओसेंट्रिक म्हणजे सूर्याला केंद्रस्थानी मानून विश्वाची कल्पना केली होती, त्या कल्पनेत तारेसुध्दा सूर्याभोंवती फिरतात असे गृहीत धरलेले होते, तिचा विस्तार केला नव्हता किंवा तिला सिध्द करून दाखवले नव्हते.

कोपरनिकसने फक्त सूर्य आणि ग्रह यांचा वेगळा विचार केला. त्यांचे भ्रमण पृथ्वीवरून कसे दिसते याची माहिती एकमेकांशी जुळवून पाहिली, बरीच किचकट आंकडेमोड केली, हे ग्रह पृथ्वीऐवजी जर सूर्यासभोवती फिरत असतील तर ते कोणत्या मार्गाने फिरतील याचा विचार केला. त्यातले बुध आणि शुक्र हे नेहमी सूर्याजवळ दिसणारे ग्रह त्याच्या जवळ राहून प्रदक्षिणा घालत असणार असे दिसत होते. गुरु व शनि यांना एकेका भ्रमणासाठी कित्येक वर्षे लागतात यावरून ते सूर्यापासून खूप दूर अंतरावरून फिरत असणार असे त्याला वाटले. मंगळ हा ग्रह त्या मानाने जवळ असावा. पृथ्वी आणि सूर्य हे गोल अवकाशात निरनिराळ्या ठिकाणी असतांना पृथ्वीवरून ते इतर ग्रह आकाशात कुठे कुठे दिसतील हे त्याने प्रयोग किंवा विचार करून पाहिले. कोपरनिकसच्या काळात पृथ्वी किंवा सूर्यापासून निरनिराळे ग्रह किती अंतरावर असतात ही माहिती उपलब्ध नसेलच. त्यामुळे त्याने अंदाजाने काही अंतरे गृहीत धरून पुन्हा पुन्हा गणिते मांडली असणार. बरेच प्रयत्न केल्यानंतर त्याला असे दिसले की जर पृथ्वी सूर्याभोंवती फिरत असली तर त्या ग्रहांच्या भ्रमणात बरीचशी सुसंगति आणता येते. त्याने हे गणितामधून सिध्द केले.

पण कोपरनिकसला हवे होते तितके तंतोतंत हिशोब लागत नसल्यामुळे त्या गणितामधून त्याचे स्वतःचे पूर्ण समाधान झाले नव्हते. त्याने सर्व ग्रहांच्या कक्षा वर्तुळाकार धरल्या होत्या पण त्या लंबवर्तुळाकार असल्यामुळे त्याची गणिते थोडी चुकत होती. शिवाय सूर्य आणि सगळे ग्रह पृथ्वीभोवतीच फिरतात ही प्रस्थापित समजूत मोडून काढून वेगळे काही तरी भलतेच सांगणे त्या काळात धार्ष्ट्याचे होतेच. कोपरनिकसला आपले समाजातले प्रस्थापित आदराचे स्थान सोडायचे नव्हते, त्याच्या स्वभावात बंडखोरपणा नसेलच. अशा अनेक कारणांमुळे त्याने कांही गाजावाजा न करता आपले सगळे संशोधन हस्तलिखित स्वरूपातच ठेवले आणि अगदी जवळच्या मोजक्या विश्वासू शिष्यांनाच ते दाखवले. कदाचित त्यांनासुध्दा ते खात्रीलायक वाटले नसेल किंवा त्यांच्या मनातही त्याबद्दल शंका असतील.

कोपरनिकस मृत्युशय्येवर पोचला असतांना यातल्या काही शिष्यांनीच पुढाकार घेऊन ते संशोधन पुस्तकरूपाने प्रसिध्द केले, पण वादविवाद टाळण्यासाठी तो एक किचकट गणितामधला तात्विक अद्भुत चमत्कार असल्याचे भासवल्यामुळे ते लगेच फारशा प्रकाशझोतात आले नाही. पुढील सुमारे शंभर दीडशे वर्षांच्या काळात होऊन गेलेल्या टायको ब्राहे, केपलर आणि गॅलिलिओ आदि शास्त्रज्ञांनी मात्र कोपरनिकसच्या लेखनाचा अभ्यास आणि पाठपुरावा केला, त्यासाठी छळसुध्दा सोसला आणि अधिक संशोधन करून त्यात अनेक सुधारणा केल्या. त्या काळात युरोपमधील सामाजिक परिस्थितीत बदल झाले, पोप आणि इतर धर्मगुरूंचा दरारा थोडा कमी झाला, नव्या संशोधकांसाठी अनुकूल वातावरण तयार झाले. त्यानंतरच्या काळात म्हणजे दीडदोनशे वर्षांनंतर कोपरनिकसने मांडलेल्या सूर्यमालिकेच्या कल्पनेला सर्वमान्यता मिळाली. 


पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे दिवसरात्र होतात हा कोपरनिकसच्या सांगण्याचा एक भाग होता. सूर्य हा एक तारा असून तो आपल्या जागी स्थिर असतो आणि मंगळ, बुध, गुरु, शुक्र व शनि हे ग्रह त्याच्याभोंवती फिरतात, इतकेच नव्हे तर आपली पृथ्वीसुध्दा त्या सूर्याभोवती फिरते असे प्रतिपादन सर्वात आधी कोपरनिकसने त्याच्या लेखांमध्ये केले. हे ग्रह बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु आणि शनि या क्रमाने सूर्यापासून दूर आहेत असे सांगितले. आज आपण ते चित्र मॉडेलमधून पाहू शकतो, पण त्या ग्रहांना सूर्याभोंवती फिरतांना प्रत्यक्षात पहायचे झाल्यास सूर्यमालिकेपासून कोट्यवधि किलोमीटर दूर जावे लागेल. तसे करणे आजही शक्यतेच्या कोटीत नाही. कोपरनिकसने पाचशे वर्षांपूर्वी पृथ्वीवरून आकाशाकडे पाहून केलेल्या निरीक्षणांवरून तसे ठामपणे सांगितले आणि फक्त गणिताच्या सहाय्याने ते सिध्द करून दाखवले यात त्याची विद्वत्ता आणि बुध्दीमत्ता दिसते. त्याने सूर्यमालिकेचे स्वरूप सांगितले असले तरी ते असे कां आहे याचे स्पष्टीकरण त्याच्याकडे नव्हते. सर आयझॅक न्यूटन यांनी ते दोनशे वर्षांनंतर दिले. दुर्बिणीमधून आकाशाचे संशोधन करणे सुरू झाल्यानंतरच्या काळात शनिच्याही पलीकडे युरेनस, नेपच्यून आणि प्लूटो अशा तीन ग्रहांचे शोध लागले. त्यातला प्लूटो आकाराने फारच लहान असल्याकारणाने आता त्याला ग्रह मानायचे नाही असे ठरवले गेले आहे.
 
चंद्र हा मात्र पृथ्वीभोवतीच फिरणारा एक गोल आहे याबद्दल सर्व शास्त्रज्ञांचे एकमत झालेले होते. पण एकटा तोच असा का फिरतो याचे गूढ वाटत होते. गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने दुर्बिणीमधून निरीक्षणे करून गुरु या ग्रहाभोंवती फिरणारे उपग्रह असतात हे सिध्द केले. त्यावरून उपग्रह या संकल्पनेला मान्यता मिळाली. त्यानंतर इतर ग्रहांभोवती फिरत राहणारे अनेक चंद्र (उपग्रह) सापडत गेले आणि सूर्यमालिकेत भर पडत गेली. अचानक प्रगट होणारे धूमकेतूसुध्दा सूर्याभोवती फिरतात हे सिध्द केले गेल्यानंतर धूमकेतूंचाही समावेश सूर्यमालिकेत होत गेला. मंगळ आणि गुरु यांच्या दरम्यान असंख्य छोट्या छोट्या अॅस्टेरॉइड्सचे एक विशाल कडे असलेले दिसले. सूर्य, ग्रह, उपग्रह, अॅस्टेरॉइड्स, धूमकेतू वगैरे मिळून आपली सूर्यमालिका होते. अशा अगणित मालिका या विश्वात आहेत यावरून ते किती विशाल आहे याची कल्पना येते.



Tuesday, October 24, 2017

हॅप्पी दिवाळीच्या शुभेच्छा

आधी हॅप्पी दसरा, मग हॅप्पी बर्थडे, हॅप्पी दिवाळी वगैरे मेसेजेसचा एका पाठोपाठ एक नुसता वर्षाव गेले तीन आठवडे होत होता. त्यात चिंब भिजून गेल्यामुळे मलासुध्दा थोडं हॅपी हॅपी वाटायला लागलेलं असतांना मला एक संस्कृतीसंरक्षक गृहस्थ भेटले.
"कसे आहात?" त्यांनी विचारलं, ती एक औपचारिक चौकशी असेल असं मला वाटलं.
मी अजून हॅपी मूडमध्येच होतो. हंसत हंसत म्हणून गेलो, "मजेत!"
ते एकदम स्तब्ध होऊन माझ्याकडे पहात राहिले. बहुधा त्यांना या उत्तराची अपेक्षा नसावी. हे जग, आपला देश, आपले शहर यात रोज उठून केवढ्या भयानक घटना घडत आहेत, आपला समाज अधःपाताच्या खोल रसातळाच्या दिशेने चालला आहे, आपली कुटुंबसंस्था कोलमडून पडायला लागली आहे, आपली शरीरे व्याधींनी आणि मने चिंतांनी पोखरून निघत आहेत, या माणसाच्या वाट्याला काय कमी पीडा आल्या आहेत? अशाही परिस्थितीत हा माणूस मजेत कसा असू शकतो? आणि तरीही तोंड वर करून तसं सांगायलाही याला काहीच वाटत नाही! असे प्रश्न मला त्यांच्या चेहे-यावर दिसायला लागल्यामुळे मी थोडासा वरमलो आणि चांचरत म्हणालो, "म्हणजे देवाच्या दयेने माझं तसं ठीक चाललं आहे, आला दिवस पुढे ढकलतो आहे."
"मग मघाशी काय म्हणालात?" ते मघाचे उत्तर विसरायला तयार नव्हते. माझ्या हातातला मोबाईल दाखवत मी बोललो, "अहो बघा ना, यात सगळं हॅपी हॅपी भरलंय्, म्हणून .... "
"हे एक खूळ किती बोकाळलंय् बघा! अहो ख्रिश्चन लोक मेरी ख्रिसमस म्हणतात, मुसलमान लोक ईद मुबारक म्हणतात, त्यांना त्यांच्या धर्माचा अभिमान आहे आणि आपले लोक? ते अजूनही इंग्रजांच्या गुलामीतून बाहेर पडलेले नाहीत, हॅप्पी दिवाळी म्हणायला यांना लाजा कशा वाटत नाहीत?" त्यांच्या सात्विक संतापाचा पारा चढायला लागला होता.
"अहो मला हे संदेश पाठवणारे सगळे लोक आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्माला आलेले आहेत. त्यांनी कधीच इंग्रजांची गुलामी पाहिलेलीही नाही."
"बघा तरीसुध्दा ते हॅपी हॅपीची पोपटपंची करताहेत! आता यांना काय म्हणावं?"
"अहो, आपण तिळगुळ घ्या गोड बोला असं संक्रांतीला म्हणतो, सोन्यासारखं रहा असं दस-याला म्हणतो तसंच एकदा मी एकाला सांगितलं, बाबारे, दिवाळी आली, आता दिवे लाव, उजेड पाड, देव तुझं भलं करो. तर तो माझ्यावरच चिडला की हो. मी त्याला मराठीत काय सांगायला पाहिजे होतं?"
"कां, शुभ दीपावली म्हणता नाही येत?"
"दिवाळी तर शुभ असतेच ना? त्यात मी माझं म्हणून काय सांगितलं?"
"मग दिवाळीच्या शुभेच्छा म्हणावं."
"आताशी मी तेच करतोय्. मराठीभाषिकांना शुभेच्छा, हिंदीभाषिकांना शुभकामनाएँ लिहितो, पण त्यात मजा, आनंद वगैरे भावना येत नाहीत. शुभेच्छा हा शब्द कुणी शोधून काढला कोण जाणे, तो कृत्रिम आणि कोरडा वाटतो. मी तामीळतेलुगू आणि मल्याळीबंगाली मित्रांचं काय करू? मला त्यांच्या भाषा येत नाहीत आणि त्यांना माझी. नेहमी आम्ही इंग्रजीमधूनच  एकमेकांशी बोलतो. ती आता आमची संपर्कभाषा आहे. यात कुणाच्या गुलामीचा संबंध कुठे येतो?"
त्यांना लगेच काही उत्तर सुचले नाही, तेवढ्यात मीच त्यांना विचारलं,
"तुम्ही तर सगळी पोथ्यापुराणं वाचली असतील, त्यात शुभेच्छा, सदीच्छा, शुभकामना हे शब्द कुठे येतात का? म्हणजे रावणाने कुंभकर्णाला किंवा सुभद्रेनं द्रौपदीला कुठल्याशा सणाच्या शुभेच्छा दिल्या होत्या असले उल्लेख आहेत का?"
"अहो, त्या काळात तशी रीत नव्हती."
"तेंव्हाच कशाला? साठपासष्ट वर्षांपूर्वी माझ्या लहानपणीसुध्दा सणासुदीच्या दिवशी लहान मुलांनी घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांच्या पाया पडायचं आणि त्यांनी मोठा हो, शहाणा हो असे आशीर्वाद द्यायचे अशी पध्दत होती. मी तरी तेंव्हा शुभेच्छा, सदीच्छा, शुभकामना हे शब्द ऐकलेसुध्दा नव्हते. ते संस्कृतमधले असल्यासारखे वाटतात, पण प्राचीन काळातल्या मूळच्या संस्कृत भाषेत ते उपयोगात होते का ?"
"मी म्हंटलं ना की ही आपली संस्कृती नाहीच, हे इंग्रजांचं आंधळं अनुकरण आहे."
"कदाचित असेलही, पण त्यात काय वाईट आहे? वैदिक काळातले लोक जसे रहात होते तसे आपण आज राहतो का? इंग्रज लोकसुध्दा रोमन साम्राज्याच्या किंवा आठव्या हेन्रीच्या काळात रहायचे तसे आता रहात नाहीत. काळाबरोबर सगळ्याच लोकांची राहणी, त्यातल्या चालीरीती हळूहळू बदलत असतात. त्यातले जे आपल्याला बरे वाटते ते आपण कळत नकळत उचलतो. त्याचा उगाच अंधानुकरण वगैरे मोठा बाऊ कशाला करायचा?"
"पण हॅप्पी दिवाळी असं म्हणायचं नाही म्हणजे नाही. आपली संस्कृतीच सगळ्या जगात श्रेष्ठ आहे. आपण तीच पाळायची." हरिदासाची कथा मूळपदावर यायला लागली.
"आणि आज थोडी मजा करून घे, आनंदी रहा असं कुणालाही सांगणे ही गोष्ट त्यात बसत नाही. असंच ना?"
हा माणूस वाया गेला आहे, याला काही सांगण्यात अर्थ नाही असा विचार त्यांनी बहुधा केला असावा. मलाही आपला मूड घालवायचा नव्हता. मी मनातल्या मनात त्यांनाही हॅप्पी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

पण माझ्या मनातलं चक्र फिरतच राहिलं. माणूस हा मुळातच उत्सवप्रिय प्राणी आहे. पूर्वीच्या काळातसुध्दा अनेक उत्सव असायचेच आणि कुठलाही उत्सव कधी एकट्याने साजरा होतच नसतो, त्यात कसलीच मजा नसते. लहानपणी आम्ही शुभेच्छा हा शब्द उच्चारत नसलो तरी गांवातल्या नातेवाइकांना आणि मित्रांना भेटून त्यांच्यासह सणवार साजरे करत होतो. या एकत्र येण्यात, सहवासातच उत्सवाचा खरा आनंद असायचा. पुढे शहरात रहायला लागल्यावर दूर दूर रहात असलेल्या सगळ्या नातेवाईकांना आणि मित्रांना प्रत्यक्ष जाऊन भेटणे शक्य होत नव्हते, पण टेलीफोनचा प्रसार झाल्यावर सणासुदीला त्यांच्याशी टेलीफोनवर बोलून एकमेकांच्या आनंदात सहभागी होणे सुरू झाले. मधल्या काळात रंगीबेरंगी आकर्षक अशी ग्रीटिंग कार्डे बाजारात आली आणि ती तुफान लोकप्रिय झाली. आपल्या मनातल्या भावना मोजक्या शब्दात व्यक्त करायचे एक आयते आणि सोपे साधन मिळाले. एकमेकांना शुभेच्छा देण्याची प्रथा या काळात प्रचलित होत गेली.

प्रत्यक्ष भेटण्याला आणि टेलीफोनवरल्या संभाषणालाही स्थळकाळाच्या मर्यादा होत्याच. इंटरनेटच्या आगमनानंतर त्या मर्यादा अमर्याद विस्तारल्या गेल्या. ईमेल, फेसबुक, वॉट्सअॅप यासारख्या माध्यमांमुळे शेकडो मित्र आणि आप्त जोडले गेले. त्या सर्वांना शब्द आणि चित्रांमधून एकाच वेळी संदेश पाठवणे शक्य झाले. ही माध्यमे मुख्यतः इंग्रजी भाषेत चालत असल्यामुळे त्या भाषेचा प्रभाव पडणारच आणि या संदेशांमध्ये ती भाषा प्रामुख्याने निदान सध्या तरी दिसणारच. आपण तरी तिला परकी मानून तिचा तिरस्कार का करायचा? त्या संदेशांमधल्या भावना आणि उद्देश समजून घेऊन उत्सव साजरा करावा हे जास्त महत्वाचे आहे. तुम्हाला काय वाटते?


Sunday, October 22, 2017

दिवाळी - संस्कृती - संस्कार

माझे एक आदरणीय आप्त श्री. मधुसूदन थत्ते यांनी "जपणे संस्कृती संस्कार" या मथळ्याखाली दिवाळीच्या चार दिवसांसंबंधी चार लेख लिहिले होते. त्यांची अनुमती घेऊन मी ते लेख माझ्या ब्लॉगवर या भागात देत आहे. यातल्या आठवणी श्री.थत्ते यांनी शब्दांकित केल्या असल्या तरी त्यातल्या कांही आठवणी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.पद्मजाताई यांच्या आयुष्यातल्या आहेत. मध्यप्रदेशांतल्या एका लहान गावी स्थाइक झालेल्या एका सधन जमीनदार कुटुंबात त्यांचे बालपण गेले असले तरी त्यांच्यावर झालेले संस्कार आणि कोकणातल्या गरीब कुटुंबातल्या श्यामच्या आईने त्याला दिलेले संस्कार यात खूप साम्य आहे. मुंबईसारख्या महानगरात वाढलेल्या आणि बाहेरचे विशाल जग पाहून आलेल्या मधुसूदन यांनी त्यांना मिळालेल्या सुसंस्कारांचे महत्व त्यांच्या अनेक लेखांमधून वेळोवेळी दाखवले आहे. हे पारंपरिक मराठी किंबहुना भारतीय संस्कार त्यांनी या चार लेखांमध्ये नेमकेपणे टिपले आहेत आणि मनोरंजक शैलीमध्ये सादर केले आहेत. मी ते चार लेख जसेच्या तसे खाली दिले आहेत.     
----------------------------------------------------------------

#जपणे_संस्कृती_संस्कार ...१
नर्कचतुर्दशी.
आईची आज्ञा: सूर्योदयाच्या आधी आज सगळ्यांच्या आंघोळी उरकायच्यात बरं...!!!
"कां, आई..?"
आमच्या लहानपणी नाही हो कुणी असे "कां" विचारले...
आईच्या बालपणी घरात दहा वीस माणसे पण सूर्योदयाच्या आधी सगळ्यांच्या आंघोळी उरकायच्या हे तर शास्त्रवचन..!!!
ऋतू आले गेले बरीच दशके मागे गेली..
आज घरात आहेत फक्त वृद्ध आई-बाबा...पण शास्त्रवचन कुठे जाईल..?
आज आईची आज्ञा जरा वेगळी ...
"अहो, सुर्र्कन आंघोळीला शिरू नका...आज तुम्हाला ओवाळायचं
आहे...!!!"
मग रांगोळीचं छोटं स्वस्तिक...त्यावर ईशान्यभिमुख पाट... पाटापुढे तेलाचे चार थेंब...
मग बाबाना हलके अंगाला तेल लावणे..
"किती पातळ झाले हे केस...कसे दाट होते नाही का ?" ह्या गप्पा...
नंतर ओवाळणे...बाबांना नमस्कार...
आणि.......... "तेवढं उटणं लावायचं विसरू नका ...मोती साबण ठेवलाय नवी वडी..."
मित्रांनो ती माई जपत आली हे सारे संस्कार इवलीशी कन्या असतानापासून...
किती वर्षे झाली आज...? पंच्याहत्तर...!!!
मधुसूदन थत्ते
१८-१०-२०१७...
-----------------------------------------------------------------------------

#जपणे_संस्कृती_संस्कार ...२
समृद्ध खेड्यातला प्रशस्त दुमजली जुना वाडा गत-पिढ्यांच्या संस्कार-पुण्याईने अजूनही एक मानाचे स्थान आहे..
छोटी उषा आईला विचारत होती..
आई, आता अंधार पडतोय पण ह्या वर कठड्यावर किती सुरेख पणत्या मांडल्या आहेत..
आई त्या प्रत्येक पणती खाली मघाशी म्हादूला मी शेणाचे लहान गोळे ठेवताना पहिले..का ग ते ठेवलेत..?
"उषा, कठड्यावर पणत्या आहेत..चुकून खाली पडू नये म्हणून आपण तसे ठेवतो...
"आणि आज लक्ष्मीपूजन ना दिवाळीचा दुसरा दिवस...आज लक्ष्मी घरा येणार...तिचे स्वागत नको का करायला..?
म्हणून तर सनई चौघडा वाजतोय..."
पण आई उंबरठ्यापासून थेट देवघरापर्यंत तू ती कुंकवाची सुंदर नाजूक पावले का काढलीस...?
"ती ना...? लक्ष्मीची पावले आहेत...देवी येते..अन त्याच पावलांनी देवघरात जाते...
"बाबांनी घरच्या लक्ष्मीचे प्रतीक असे काही दागिने, सोन्याच्या जुन्या मोहोरा, आणि येणा-या वर्षासाठी जमा-खर्चाची वही असे सारे पुजलेले आहे...
"लक्ष्मी त्यावर नजर देईल...प्रसन्नतेने 'तथास्तु' म्हणेल ..त्या जामदारखान्याची दारे आज सताड उघडी आहेत पाहिलेस का..? लक्ष्मी तिथेही नजर देईल अन आल्या पावली त्या कुंकुम पावलांवरून वाड्याला आशीर्वाद देऊन माघारी जाईल...पण जाताना इकडे पाठ करून जाणार नाही..."
आई...खरं का ग हे सगळं..? मला दिसेल लक्ष्मी...?
कोजागिरीला आली होती की नाही..? पण नुसती "कोण कोण जागे आहे.." असे विचारून गेली..तेव्हा तरी मला दिसली नाही...!!!
आई काय बोलणार...? म्हणाली..."बाळा,, ह्या घराची लक्ष्मी तूच नाही का...?..."
मित्रांनो लक्ष्मी पूजनाचे हे सत्तर वर्षांपूर्वीचे दृश्य उषाने पाहिले...ऊषाच्या मनात ते कायम आहे...
तेव्हा कॉम्पुटर नव्हते ..iCloud नव्हते..साधे आपले आकाश होते.. आकाशाने मात्र पाहिले होते,
आज उषा आईच काय..आजी पण झाली आहे....आणि दर दिवाळीला असेच लक्ष्मी पूजन करत असते...
घरे बदलली...परिसर बदलले...परिवार बदलले...
पण....
आकाश तर तेच आहे..!!!!!!!!!
मधुसूदन थत्ते
१९-१०-२०१७

----------------------------------------------------------------------------------------

#जपणे_संस्कृती_संस्कार ...३
चिमुकल्या उषाला आजी कौतुकाने म्हणाली.."एका मुलीला आज बाबा ओवाळणीत काय बरं देणार..?"
सुंदर रांगोळी काढ, बसायला ईशान्येकडे होईल असा पाट ठेव..आई तुझ्या हाती सज्ज असे ताम्हन देईल अन मग बाबांना ओवाळायचे...!!!
पण आजी मीच का? दादा का नाही ओवाळणार बाबांना आज पाडव्याला...?
"अगं, कन्या हे परक्याचे धन. ओवाळणे म्हणजे दीर्घायुष्य चिंतन... स्त्रीचे रक्षण आधी पिता मग पती करत असतो.. त्यांना दीर्घायुष्य लाभावे हे स्त्रीच्या मनात येणं स्वाभाविक नाही का..?
हो, आजी, तू देव्याकवच रोज म्हणतेस त्यात देवीचं पहिलं रूप कन्येचं म्हटलं आहे.."प्रथमं शैलपुत्री च..." पार्वती हिमालयाची कन्या नाही का...?
उषा दूर कुठेतरी नजर लावून कल्पना करत होती पार्वती हिमालयाला कशी बुवा ओवाळत असावी...!!!
आजी पुढे म्हणाली..
"वर्षभरातले मानाचे साडेतीन मुहूर्त...
"एक वर्षप्रतिपदा, दुसरा अक्षय्य तृतीया, तिसरा दसरा आणि उरलेला अर्धा आज..दिवाळीतला पाडवा...तो अर्धा आणि वर्षाची शुभ सुरुवात वर्षप्रतिपदाने होते म्हणून तो पूर्ण एक मुहूर्त.
"आणि आपले गोधन आजच्या पाडव्याला गोठ्यातून मोकळे करतांना रेवणीत (दिंडी दरवाजा)
गवताची गंजी पेटवायची...त्यावरून गोधन उड्या मारीत जाईल..मग वर्षभर त्यांना त्या अग्निस्पर्शाने कसलाही आजार होणार नाही ही आपली समजूत.
प्रथा...एक एक भावनांच्या रेशमी धाग्यांनी कल्पना करून पडलेल्या प्रथा..
आज इतक्या दशकांनंतर ह्या प्रथा स्वतःच आजी असलेली उषा मुलं-नातवंडांना मोठ्या प्रेमाने सांगत होती..
आजच्या चिमुकल्यांना हे प्रत्यक्ष कसे दिसावे..काळ खूप खूप बदलला आहे..
तरी पण आजच्या चिमुकल्यात एखादी अशी "उषा" असणार आहे जी दूर कुठेतरी नजर लावून कल्पना करेल पार्वती हिमालयाला कशी बुवा ओवाळत असावी...!!!
पाडव्याचे शुभचिंतन मित्रांनो
मधुसूदन थत्ते
पद्मजा थत्ते
२०-१०-२०१७

-------------------------------------------------------------------------------------

#जपणे_संस्कृती_संस्कार ... ४
"१९५० चा सुमार ...कानी गोड स्वर आले...
"जमुनाके तीर..."
आज बाबांनी अब्दुल करीम खानसाहेबांनी भैरवी लावली होती...
छोट्या उषाने आज दादासाठी पाट मांडला, आजीने सुंदर रांगोळी काढली..आज दादाचे अभ्यंग स्नान..मग फराळ..
"आज भांडायचं नाही दादाशी"
आजी आमचं कधी भांडण झालेलं पाहिलं आहेस का..?
"नाही गं बाबी..मी उगीच म्हटले..आज भाऊबीज ना...?
संध्याकाळ कशी पटकन आली...हर्षभरे ओवाळणीचा कार्यक्रम झाला...
इतक्यात दाराशी कोणी डोकावले..आजी पुढे झाली..
"अरे तुम हो निर्मल ..?"
निर्मल कुशवाह हा एका गरीब कातक-याचा एकुलता एक मुलगा...उषाएवढाच... आत्ता कसा काय बरं आला..?
दादीमाँ, उषादीदी मेरी भी आरती उतारेगी आज..?
पोरगं काहीतरी एका फडक्यात बांधलेलं मुठीत लपवत होतं...
"आओ बेटा. जरूर आरती उतारेगी..."
उषाने प्रेमभराने त्याला पाटावर बसवले..औक्षण केले..
मग निर्मलने ताम्हनात ते फडकं मोकळं केलं.. म्हणाला..."ये चियें (चिंचोके) . दीदी को प्यारे लगते है ना..? मैने खुद जमा करके रक्खे थे..!!"
ती भाऊबीज एकदम जणू लखलखली..उषा खूप आनंदली...अन..आजीच्या पापण्या ओलावल्या ..!!!
खूप खूप वर्षे मागे गेली ह्या दिव्य भाऊबीजेच्या प्रसंगानंतर ..
पण बाबांनी त्या सकाळी लावलेली भैरवी आजही सुचवते ...भाऊबीज...दिवाळी सणाची भैरवी ....संपली दिवाळी..
आजची उषा नातीला हे आठवून आठवून सांगत होती...
आजी, निर्मल आज कुठे असेल...? ...बालसुलभ पृच्छा...!!!
आजीच्या मनात हाच प्रश्न डोकावला...नक्की आज तो कुणी मोठा जमीनदार झाला असावा...!!!
आजी तिला लहानपणी आवडणारे गाणे गुगुणत होती...
सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती...
ओवाळीते भाऊराया रे
वेड्या बहिणीची रे वेडी माया...!!!
मधुसूदन थत्ते
२१-१०-२०१०
-----------------------------------------------------------------------------------

Friday, October 20, 2017

दिन दिन दिवाळी

मी सुध्दा अगदी लहान असतांना म्हणजे शाळेत जायच्याही आधी एक बडबडगीत ऐकले आणि गुणगुणले होते आणि ते अजून माझ्या लक्षात आहे. यातला कोण लक्षुमन, कसली खोब-याची वाटी आणि कुठल्या वाघाच्या पाठीत कुणी काठी घालायची असले प्रश्न तेंव्हा माझ्या मनात आले नव्हते आणि नंतर मलाही कोणी विचारले नाहीत. दर वर्षी दिवाळीच्या दिवसात या गाण्याची पारायणे होत असत आणि त्या वेळी घरी आलेल्या पाहुण्यांमध्ये जी कोणी लहान मुले असतील त्यांना हे गाणे शिकवून त्यांच्याकडून बोबड्या बोलात हावभावासह म्हणून घेतले जात असे.

दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी ।
गाई-म्हशी कुनाच्या, लक्षुमनाच्या ।
लक्षुमन कुनाचा, आई-बापाचा ।
दे माय खोबऱ्याची वाटी ।
वाघाच्या पाठीत घालीन काठी ।।

या बडबडगीताला जोडून दिवाळीमधल्या इतर दिवसांचे छान वर्णन करणारे एक गाणे मला या ध्वनिफीतेमध्ये मिळाले.
https://www.youtube.com/watch?v=bR3dneyjJ-4
----------------------

माझ्या जन्माच्याही आधी म्हणजे १९४० च्या काळातल्या शेजारी या खूप गाजलेल्या आणि सामाजिक प्रबोधन करणा-या चित्रपटातले अत्यंत जुने पण तरीही आजतागायत ऐकू येणारे असे दीपोत्सवावरचे अजरामर गाणे आहे, लखलख चंदेरी. शेजारी राहणा-या दोन मित्रांमध्ये निर्माण झालेला दुरावा संपून शेवट गोड झाल्यानंतर सगळे गांवकरी एकमुखाने हे गीत गात आणि त्या तालावर नाचत दिवाळीचा आनंदोत्सव कसा साजरा करतात याचे चित्रण या गाण्यात सुरेख केले आहे.
https://www.youtube.com/watch?v=qNAdSpieRCg
लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया।
झळाळती कोटी ज्योती या, हा, हा।।

चला धरू रिंगण, चुडी गुढी उंचावून ।
आकाशीच्या अंगणात, मंजुळ रुणझुण ।
नाचती चंद्र तारे,  वाजती पैंजण ।
छुनछुन झुमझुम, हा, हा ।।

झोत रुपेरी, भूमिवरी गगनात ।
धवळली सारी सृष्टी, नाचत डोलत ।
कणकण उजळीत, हासत हसवीत ।
करी शिणगार, हा, हा ।।

आनंदून रंगून, विसरून देहभान ।
मोहरली सारी काया, हरपली मोहमाया ।
कुडी चुडी पाजळून, प्राणज्योती मेळवून ।
एक होऊ या, हा, हा ।।

----------------------------------------

माझ्या लहानपणी १९५५ साली आलेल्या भाऊबीज या सिनेमातले सोनियाच्या ताटी हे गाणे माझ्या एकाद्या बहिणीच्या तोंडी ऐकल्याशिवाय माझी भाऊबीज कधी साजरी होत नव्हती. आशाताईंनी गायिलेले हे गोड गाणेसुध्दा साठ वर्षांनंतर अजून टिकून राहिले आहे.  भावाबहिणीमधल्या नात्याचा सगळा गोडवा या गाण्यात उतरला आहे.
https://www.youtube.com/watch?v=p_C1k78XuBs
सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती ।
ओवाळिते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया ।।

माया माहेराची पृथ्वीमोलाची ।
साक्ष याला बाई, चंद्रसूर्याची ।
कृष्ण द्रौपदीला सखा रे भेटला ।
पाठीशी राहु दे छाया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया ।।

चांदीचे ताट, चंदनाचा पाट ।
सुगंधी गंध दरवळे, रांगोळीचा थाट ।
भात केशराचा, घास अमृताचा ।
जेवू घालिते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया ।।

नवलाख दिवे हे निळ्या आभाळी ।
वसुंधरा अशी चंद्रा ओवाळी ।
नक्षत्रांची सर, येई भूमिवर ।
पसरी पदर भेट घ्याया ।
चंद्र वसुधेला, सखा रे भेटला ।
पाठीशी राहु दे छाया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया ।।

पंचप्राणांच्या वाती, उजळल्या ज्योती
ओवाळिते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया

-----------------------------------------
अष्टविनायक या चित्रपटातली सगळीच गाणी तुफान लोकप्रिय झाली आणि लोकांच्या ओठावर बसली. त्यातले एक गाणे खास दिवाळी या सणावर होते. तसे पाहता अमावास्येच्या आगे मागे असलेल्या दिवाळीत कसले मंद आणि धुंद चांदणे आले आहे ? उलट दिव्यांच्या रांगा लावून गडद अंधाराचा नाश करणे हा दीपावलीचा उद्देश असतो. पण ज्यांच्या मनातच प्रेमाचे चांदणे फुलले आहे, नयनांमध्ये दीप उजळले आहेत त्यांना त्याचे काय ? दिवाळीचा परम आनंद आणि उत्साह या गाण्यात छान टिपला आहे.
https://www.youtube.com/watch?v=oPIMAnIdq2s

आली माझ्या घरी ही दिवाळी ।
सप्तरंगात न्हाऊन आली ।।

मंद चांदणे धुंद श्वास हा, मी तर त्यात भिजावे ।
जन्म जन्म रे तुझ्या संगती एकरुप मी व्हावे ।
प्रीत नयनी वसे, लाज गाली हसे ।
कोर चंद्राची खुलते भाळी ।।
आली माझ्या घरी ही दिवाळी ।।

पाऊल पडता घरी मुकुंदा, गोकुळ हरपून गेले ।
उटी लाविता अंगी देवा, सुगंध बरसत आले ।
हर्ष दाटे उरी, नाथ आले घरी ।
सूर उधळीत आली भूपाळी ।।
आली माझ्या घरी ही दिवाळी ।।

नक्षत्रांचा साज लेऊनी, रात्र अंगणी आली ।
दीप उजळले नयनी माझ्या ही तर दीपावली ।।
संग होता हरी जाहले बावरी ।
मी अभिसारीका ही निराळी ।।
आली माझ्या घरी ही दिवाळी ।।
------------------------------


Tuesday, October 03, 2017

शून्याचा शोध





शून्याचा शोध नक्की कुणी लावला असेल यावर कांही गंभीर चर्चा आणि अनेक विनोदी चुटके, व्यंगचित्रे वगैरे पहाण्यात येतात. शोध लावणे हा मराठी शब्दच मुळी बुचकळ्यात टाकणारा आहे. एकादी गोष्ट आधी हरवली असली तर ती कुणीतरी शोधून काढली किंवा कुणाला तरी ती सापडली असे म्हणण्यात काही अर्थ आहे. हे शून्य अमक्यातमक्याने शोधून काढले असे म्हणायला  ते कधी तरी हरवले होते का ?

श्रेष्ठ भारतीय शास्त्रज्ञांनी लावलेला शून्याचा शोध ही जगाला दिलेली एक अद्भुत भेट आहे हे जगातल्या विद्वानांनी मान्य केले आहे. सर्वाधिक लोक त्याचे श्रेय आर्यभट यांना देतात, तर बरेचसे लोक ते ब्रह्मगुप्त यांना देतात. कांही लोकांच्या मते आर्यभटांच्या आधी होऊन गेलेले विद्वान पिंगला यांनी किंवा त्यांच्याही पूर्वी कोणा अज्ञात विद्वानांनी तर काहींच्या मते नंतरच्या काळातल्या भास्कराचार्यांनी शून्याचा शोध लावला. म्हणजे ते पुन्हा पुन्हा हरवत होते की काय ?

आर्यभट, ब्रह्मगुप्त वगैरे शास्त्रज्ञांच्या काळांच्या खूप पूर्वी लिहिल्या गेलेल्या प्राचीन संस्कृत साहित्यामध्ये निरनिराळ्या संख्यांचे उल्लेख कसे येतात अशी शंका आपल्या मनात येते. रावणाला दहा तोंडे होती तर कौरवांची संख्या शंभर होती. विष्णुसहस्रनाम प्रसिध्द आहे. कार्तवीर्यार्जुनाला हजार हात होते तर सगराला साठ हजार पुत्र होते. गणेशाचे वर्णन "वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ" असे केले आहे आणि श्रीरामाची स्तुति "चरितम् रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्" अशी करून "सहस्रनामतत्तुल्ल्यम्" अशी रामनामाची महती सांगितली आहे. महाभारत युध्दामध्ये अठरा अक्षौहिणी सैन्याने भाग घेतला होता, त्यातल्या प्रत्येक अक्षौहिणीमध्ये किती हत्ती, घोडे, पायदळ वगैरे होते याचे मोठमोठे आंकडे सांगितले जातात. चार युगांमधल्या वर्षांची संख्या कित्येक लक्षांमध्ये दिली जाते. गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव असतात असे म्हणतात. पौराणिक कथा आणि स्तोत्रे यांमध्ये मोठमोठ्या संख्यांचे उल्लेख असलेली अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्यांची रचना झाली तेंव्हा अजून शून्याचा शोध लागलेला नसेल ?

शिवाय 'शून्य' या शब्दाचा अर्थ काय? कुठल्याही वस्तूचे नसणे म्हणजे तिची संख्या शून्य इतकी असणे असा अर्थ आपण लावतो. पैशाचे पाकीट रिकामे झाले, धान्याचा डबा रिकामाच असला किंवा झाला तर त्यातली उणीव, पोकळी, रिकामेपणा वगैरे गोष्टी कुणालाही आपोआप जाणवतात. आपण बेअक्कल माणसाला अक्कलशून्य म्हणतो. कुठेच लक्ष नसलेला माणूस शून्यात पहात असतो. नसणे या अर्थाच्या शून्याच्या  या सर्वसामान्य रूपाचा मुद्दाम शोध लावायची काय गरज आहे? ते आपल्याला आपोआप जाणवते. मग प्राचीन भारतीयांनी कुठल्या शून्याचा शोध लावला असे सांगतात?

या शून्याचा संबंध गणिताशी येतो. एक, दोन, दहा, वीस आदि संख्यांचा उगम वस्तू किंवा माणसे, प्राणी वगैरेंची मोजमापे करण्यासाठी झाला. यातले एकापासून दहापर्यंतचे आकडे हातांच्या बोटांवर मोजता येत होते. त्याहून जास्त वस्तू मोजायच्या झाल्यास दहा दहांचे गट करून ते गट मोजायचे आणि उरलेल्या वस्तू वेगळ्या मोजायच्या असे करून ती संख्या काढता येत होती. उदाहरणार्थ तीन वेळा दहा अधिक एक सुटा म्हणजे एकतीस. अशा प्रकारे दहा वेळा दहा म्हणजे शंभर, दहा वेळा शंभर म्हणजे हजार अशा प्रकारे संख्यांची नांवे ठेवली गेली. रोजच्या जीवनात याहून मोठ्या संख्या मोजण्याची गरजच पडत नव्हती. अस्तित्वात नसलेल्या वस्तू कशा मोजणार ? त्यासाठी शून्य नावाच्या संख्येचीही गरज नव्हती. व्यवहारात आवश्यकता नसली तरी विद्वान लोकांनी कल्पनेमधून कोटी, अब्ज, परार्ध यासारख्या अनेक मोठमोठ्या संख्यांची रचना केली होती. पूर्वीच्या काळात या संख्या अक्षरांमधूनच व्यक्त केले जात असाव्यात.

एक, दोन, तीन अशा शब्दांऐवजी १, २, ३ अशी चिन्हे (अंक) लिहिली तर संख्या लिहिणे सोयीचे होईल अशी नामी कल्पना भारतीयांना सुचली तशीच इतर देशांमधल्या लोकांनाही निरनिराळ्या काळांमध्ये सुचली. उदाहरणार्थ रोमन लोकांनी एक, पाच, दहा यांचेसाठी I, V, X अशी अक्षरेच चिन्हांप्रमाणे योजिली आणि त्यांचा उपयोग करून ते संख्या लिहू लागले, जसे आठसाठी VIII, चौदासाठी XIV वगैरे. यात शून्याला स्थान नव्हते. जितकी मोठी संख्या असेल तितकी जास्त चिन्हे वापरायची आणि ती लक्षात ठेवण्याची गरज होती. ती संख्या वाचणे सोपे नव्हते.

भारतीय शास्त्रज्ञांना एक अफलातून कल्पना सुचली. त्यांनी १ हूनही लहान असा शून्य नावाचा कोणतेही मूल्य नसलेला अंक ० या वेगळ्या चिन्हासह तयार केला. १ ते ९ पर्यंत आंकडे (चिन्हे) लिहून झाल्यावर दहाव्या आकड्यासाठी वेगळे चिन्ह न वापरता १ या आकड्याच्या समोर ० मांडून त्यांनी १० हा अंक तयार केला. १० च्या पुढील अंक लिहिण्यासाठी १ च्या पुढे १, २, ३ वगैरे लिहून ११,१२,१३ वगैरे अंक तयार केले. ९१, ९२, ९३ करीत ९९ च्या नंतर १ च्या पुढे दोन शून्ये मांडून १०० (शंभर) हा अंक तयार केला. अशा प्रकारे कितीही मोठी संख्या फक्त दहा चिन्हांमधून लिहिता येणे शक्य झाले. असे अंक लिहिणे सर्वात आधी कुणी सुरू केले याची स्पष्ट नोंद मिळत नाही. प्राचीन काळातली जी कांही भूर्जपत्रे, ताम्रपत्रे, शिलालेख वगैरे आज उपलब्ध आहेत ते सगळे अक्षरांमध्ये लिहिलेले आहेत हे पाहता अंकांबद्दलचे फारसे स्पष्ट पुरावे दिसत नाहीत.

महाभारतामध्ये पांडव आणि कौरव यांची एकंदर संख्या "वयम् पंचाधिकम् शतम्" असे युधिष्ठिर सांगतात. यात १,०,० या तीन अंकांना मिळून शतम् हा एक शब्द येतो. आजही १०५ असे लिहिलेले असले तरी आपण ते एकशे पाच असे वाचतो. एक आणि पांच यांचा उच्चार करतो, पण दशमस्थानावरल्या शून्याचा उल्लेख करत नाही. यामुळेच अक्षरांमध्ये लिहिलेल्या किंवा पाठांतरामधून शिकवल्या गेलेल्या साहित्यामधून त्या आंकड्यातल्या शून्याचे अस्तित्व लक्षात येत नाही. संस्कृत भाषेमधले आपल्याला माहीत असलेले सर्व साहित्य श्लोक, ऋचा किंवा मंत्रांच्या स्वरूपात असल्यामुळे ते अक्षरांमध्ये आहे. त्यात संख्यांचे आंकडे किंवा त्यातली शून्ये दिसत नाहीत. कदाचित त्या काळात फक्त आंकडेमोड करण्यासाठी अंकांचा उपयोग करत असतील आणि आलेली उत्तरे किंवा निष्कर्ष अक्षरांमध्ये लिहून ठेवत असतील. ती आपल्याला या विद्वानांच्या ग्रंथांमध्ये मिळतात.

आर्यभटांनी लिहिलेल्या ग्रंथात "स्थानम् स्थानम् दशगुणे स्यात" असे विधान आहे. त्यामध्ये दशमानपध्दतीमधील स्थानमूल्याची (प्लेसव्हॅल्यूची) व्याख्या दिसते. अशा पध्दतीने लिहिलेल्या १०, १००, १००० आदि संख्यांमध्ये शून्याचा उपयोग होणे स्वाभाविक आहे म्हणून शून्याच्या शोधाचे श्रेय त्यांना दिले जाते. ब्रम्हगुप्ताने लिहिलेल्या ग्रंथात शून्य या आंकड्याची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार वगैरेंचे नियमच सांगितले आहेत. यामुळे त्यांनाही हे श्रेय दिले जाते.

कुठलीही गोष्ट मोजण्याची सुरुवात एकापासून होते, एक हा त्यातला सर्वात लहान आंकडा असतो, त्याहून लहान फक्त अपूर्णांक असतात. पण शून्य हा अंक निर्माण झाल्यानंतर परिस्थिती बदलली. त्यानंतर शून्यापेक्षाही लहान म्हणजे -१, -२ अशा ऋण अंकांची कल्पना मांडली गेली आणि अंकगणिताचा अधिक विकास होत गेला. समीकरणे, सूत्रे वगैरे लिहिणे व सोडवणे सोपे झाले. पुढे यातून बीजगणित आणि कॅल्क्युलस या शाखांचा जन्म झाला. शून्याचा शोध किती महत्वाचा होता याची कल्पना यावरून येईल.

'शून्याचा शोध' लावला याचा अर्थ आंकड्यांच्या जगात शून्याला स्थान दिले गेले. हे अंकगणितामधले शून्य सर्वात आधी भारतीयांनी उपयोगात आणले खरे, पण ते नेमके कुणी आणि कोणत्या कालखंडात सुरू केले हे अद्याप गूढच आहे आणि ते तसेच राहणार आहे. त्याबद्दल भक्कम पुराव्यासह विश्वासार्ह अशी माहिती कदाचित मिळणारही नाही. आर्यभटांच्या ग्रंथामध्ये पहिल्यांदा शून्याचे संकेत मिळाले आणि ब्रह्मगुप्तांनी शून्याच्या उपयोगासंबंधीचे नियम सांगितले म्हणून शून्याचा शोध लावण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. 

Saturday, September 23, 2017

देवीची स्तोत्रे

या नवरात्रीच्या दिवसांत देवीच्या मला मिळतील तेवढ्या स्तोत्रांचे संकलन करायचे ठरवले आहे.
१. देव्यपराधक्षमापनस्तोत्र
२. देवीसुक्त
३. महिषासुरमर्दिनी स्तोत्र
४.अन्नपूर्णा स्तोत्र
५.त्रिपुरसुन्दर्यष्टकम्
६. भवान्यष्टकम्
७. अर्गला स्तोत्रम्
८. श्री दुर्गा सप्तश्लोकी स्तोत्र
९. दुर्गाद्बात्रिंशन्नाममाला         ..... नवी भर दि. २८-०९-२०१९
१०. अष्टक श्रीरेणुकेचे       ..... नवी भर दि. ०५-१०-२०१९
----------------------------------------------------------------------------------

१० अष्टक श्रीरेणुकेचे


लक्षकोटी चंडकीर्ण सुप्रचंड विलपती ।
अंब चंद्रवदनबिंब दिप्तमाझी लोपती ।
सिंह शिखर अचळवासी मूळपीठनायका ।
धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥ १ ॥
आकर्ण अरुणवर्ण नेत्र, श्रवणि दिव्य कुंडले ।
डोलताति पुष्पहार भार फार दाटले ।
अष्टदंडि, बाजुबंदि, कंकणादि, मुद्रिका, ।
धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥ २ ॥
इंद्रनीळ,पद्मराज, पाचू हार वेगळा ।
पायघोळ बोरमाळ, चंद्रहार वेगळ।
पैंजणादि भूषणेंचि लोपल्याति पादुका ।
धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥ ३ ॥
इंद्र, चंद्र, विष्णु, ब्रह्म, नारदादि वंदिती ।
आदि अंत-ठावहीन आदि शक्ति भगवती ।
प्रचंड चंड मुंड खंड विखंडकारि अंबिका ।
धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥ ४ ॥
पर्वताग्रहवासि पक्षी 'अंब अंब ' बोलती ।
विशाल शालवृक्ष रानिं भवानि ध्यानि डोलती ।
अवतार-कृत्यसार जड-मुढादि तारका ।
धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥ ५ ॥   
अनंत ब्रह्मांड कोटिं, पूर्वमुखा बैसली ।
अनंत गुण, अनंत शक्ति, विश्वजननी भासली ।
सव्यभागी दत्त, अत्रि, वामभागिं कालिका ।
धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥ ६ ॥
पवित्र मातृ-क्षेत्र-धन्य वासपुण्य आश्रमी ।
अंब दर्शनासि भक्त-अभक्त येतीं आश्रमी ।
म्हणुनि विष्णुदास नीज लाभ पावला फुका ।
धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥ ७ ॥
विष्णुदास यांनी रचिलेले रेणुका अष्टक पूर्ण झाले. अष्टक असे म्हटले असले तरी यांत सातच श्र्लोक आहेत.
--------
९. दुर्गाद्बात्रिंशन्नाममाला
दुर्गा दुर्गार्तिशमनी दुर्गापद्बिनिवारिणी ।
दुर्गमच्छेदिनी दुर्गसाधिनी दुर्गनाशिनी ।।

दुर्गतोद्धारिणी दुर्गनिहिन्त्री दुर्गमापहा ।
दुर्गमज्ञानदा     दुर्गदैत्यलोकदवानला ।।

दुर्गमा दुर्गमालोका दुर्गमात्मस्वरूपिणी ।
दुर्गमार्गप्रदा   दुर्गमविद्या   दुर्गमाश्रिता ।।

दुर्गमज्ञानसंस्थाना   दुर्गमध्यानभासिनी ।
दुर्गमोहा  दुर्गमगा   दुर्गमार्थस्वरूपिणी ।।

दुर्गमासुरसंहन्त्री      दुर्गमायुधधारिणी ।
दुर्गमांगी  दुर्गमता  दुर्गम्या   दुर्गमेश्वरी ।।

दुर्गभीमा  दुर्गभामा  दुर्गभा दुर्गदारिणी ।

-----------------------------------------------------

८. श्री दुर्गा सप्तश्लोकी स्तोत्र

हे सप्तश्लोकी दुर्गास्तुती स्तोत्र मला माझे वडील बंधू डॉ.धनंजय घारे यांनी पाठवले होते. यासाठी मी त्यांचा आभारी आहे. दुर्गा सप्तशती या मोठ्या ग्रंथाबद्दल ऐकले असेलच. त्याचे सार या सात श्लोकात सामावले आहे असे म्हणतात.

ॐ अथ सप्तश्लोकी दुर्गा (सप्तशती)
|| ॐ अस्य श्री दुर्गा सप्तश्लोकी स्तोत्र मंत्रस्य नारायण ऋषि: अनुष्टुप् छ्न्द: श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवता: |
श्री दुर्गा प्रीत्यर्थम् सप्तश्लोकी दुर्गा पाठे विनियोग: |
ॐ ज्ञानिनां अपि चेतांसि देवी भगवती हि सा |
बलाद् आकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति ।।१।।
दुर्गे स्मृता हरसि भीतिम् अशेष जन्तो: |
स्वस्थै: स्मृता मतिं अतीव शुभां ददासि ||
दारिद्र्य दु:ख भय हारिणि का त्वदन्या |
सर्वोपकार करणाय सदार्द्र चित्ता ।।२।।
सर्व मङ्गल माङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके |
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते ।।३।।
शरणागत दीनार्त परित्राण परायणे |
सर्वस्यार्ति हरे देवि नारायणि नमोऽस्तुते ।।४।।
 सर्वस्वरूपे सर्वेशे सर्व शक्ति समन्विते |
भयेभ्य: त्राहि नो देवि दुर्गे देवि नमोऽस्तुते ।।५।।
रोगान् अशेषान् अपहंसि तुष्टा |
रुष्टा तु कामान् सकलान् अभीष्टान् ||
त्वां आश्रितानां न विपत् नराणां |
त्वां आश्रिता हि आश्रयतां प्रयान्ति ।।६।।
सर्वा बाधा प्रशमनं त्रैलोक्यस्य अखिलेश्र्वरी |
एवं एव त्वया कार्यम् अस्मद् वैरि विनाशनं ।।७।।

|| इति सप्तश्लोकी दुर्गास्तोत्र सम्पूर्णा ||

------------------------------------------------------------------------
७. अर्गला स्तोत्रम्

या स्तोत्राचे निरनिराळे पाठभेद आंतर्जालावर मिळतात. त्यातला एक मी खाली दिला आहे. व्हीडिओमधले स्तोत्र जरासे वेगळेच आहे. मी या विषयामधला तज्ज्ञ नसल्यामुळे त्याबद्दल काही सांगू शकणार नाही. थोडा फरक असला तरी सगळ्या स्तोत्रांचा मुख्य मतितार्थ एकच आहे. तो म्हणजे हे माते मला रूप, जय आणि यश यांचे वरदान दे.

https://www.youtube.com/watch?v=lhBUnUkrslM

अर्गला स्तोत्रम्
जयत्वंदेविचामुण्डेजयभूतापहारिणि।
जयसर्वगतेदेविकालरात्रिनमोऽस्तुते॥१॥

जयन्तीमङ्गलाकालीभद्रकालीकपालिनी।
दुर्गाशिवाक्षमाधात्रीस्वाहास्वधानमोऽस्तुते॥२॥

मधुकैटभविध्वंसिविधातृवरदेनमः।
रूपंदेहिजयंदेहियशोदेहिद्विषोजहि॥३॥

महिषासुरनिर्नाशिभक्तानांसुखदेनमः।
रूपंदेहिजयंदेहियशोदेहिद्विषोजहि॥४॥

धूम्रनेत्रवधेदेविधर्मकामार्थदायिनि।
रूपंदेहिजयंदेहियशोदेहिद्विषोजहि॥५॥

रक्तबीजवधेदेविचण्डमुण्डविनाशिनि।
रूपंदेहिजयंदेहियशोदेहिद्विषोजहि॥६॥

निशुम्भशुम्भनिर्नाशित्रैलोक्यशुभदेनमः।
रूपंदेहिजयंदेहियशोदेहिद्विषोजहि॥७॥

वन्दिताङ्घ्रियुगेदेविसर्वसौभाग्यदायिनि।
रूपंदेहिजयंदेहियशोदेहिद्विषोजहि॥८॥

अचिन्त्यरूपचरितेसर्वशत्रुविनाशिनि।
रूपंदेहिजयंदेहियशोदेहिद्विषोजहि॥९॥

नतेभ्यःसर्वदाभक्त्याचापर्णेदुरितापहे।
रूपंदेहिजयंदेहियशोदेहिद्विषोजहि॥१०॥

स्तुवद्भयोभक्तिपूर्वंत्वांचण्डिकेव्याधिनाशिनि।
रूपंदेहिजयंदेहियशोदेहिद्विषोजहि॥११॥

चण्डिकेसततंयुद्धेजयन्तिपापनाशिनि।
रूपंदेहिजयंदेहियशोदेहिद्विषोजहि॥१२॥

देहिसौभाग्यमारोग्यंदेहिदेविपरंसुखम्।
रूपंदेहिजयंदेहियशोदेहिद्विषोजहि॥१३॥

विधेहिदेविकल्याणंविधेहिविपुलांश्रियम्।
रूपंदेहिजयंदेहियशोदेहिद्विषोजहि॥१४॥

विधेहिद्विषतांनाशंविधेहिबलमुच्चकैः।
रूपंदेहिजयंदेहियशोदेहिद्विषोजहि॥१५॥

सुरासुरशिरोरत्ननिघृष्टचरणेऽम्बिके।
रूपंदेहिजयंदेहियशोदेहिद्विषोजहि॥१६॥

विद्यावन्तंयशस्वन्तंलक्ष्मीवन्तञ्चमांकुरु।
रूपंदेहिजयंदेहियशोदेहिद्विषोजहि॥१७॥

देविप्रचण्डदोर्दण्डदैत्यदर्पनिषूदिनि।
रूपंदेहिजयंदेहियशोदेहिद्विषोजहि॥१८॥

प्रचण्डदैत्यदर्पघ्नेचण्डिकेप्रणतायमे।
रूपंदेहिजयंदेहियशोदेहिद्विषोजहि॥१९॥

चतुर्भुजेचतुर्वक्त्रसंस्तुतेपरमेश्वरि।
रूपंदेहिजयंदेहियशोदेहिद्विषोजहि॥२०॥

कृष्णेनसंस्तुतेदेविशश्वद्भक्त्यासदाम्बिके।
रूपंदेहिजयंदेहियशोदेहिद्विषोजहि॥२१॥

हिमाचलसुतानाथसंस्तुतेपरमेश्वरि।
रूपंदेहिजयंदेहियशोदेहिद्विषोजहि॥२२॥

इन्द्राणीपतिसद्भावपूजितेपरमेश्वरि।
रूपंदेहिजयंदेहियशोदेहिद्विषोजहि॥२३॥

देविभक्तजनोद्दामदत्तानन्दोदयेऽम्बिके।
रूपंदेहिजयंदेहियशोदेहिद्विषोजहि॥२४॥

भार्यामनोरमांदेहिमनोवृत्तानुसारिणीम्।
रूपंदेहिजयंदेहियशोदेहिद्विषोजहि॥२५॥

तारिणिदुर्गसंसारसागरस्याचलोद्भवे।
रूपंदेहिजयंदेहियशोदेहिद्विषोजहि॥२६॥

इदंस्तोत्रंपठित्वातुमहास्तोत्रपठेन्नरः।
सप्तशतींसमाराध्यवरमाप्नोतिदुर्लभम्॥२७॥


---------------------------------------------------------
६.भवान्यष्टकम्

न तातो न माता न बन्धुर्न दाता
न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता ।
न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥१॥

भवाब्धावपारे महादुःखभीरु
पपात प्रकामी प्रलोभी प्रमत्तः ।
कुसंसारपाशप्रबद्धः सदाहं
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥२॥

न जानामि दानं न च ध्यानयोगं
न जानामि तन्त्रं न च स्तोत्रमन्त्रम् ।
न जानामि पूजां न च न्यासयोगं
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥३॥

न जानामि पुण्यं न जानामि तीर्थ
न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित् ।
न जानामि भक्तिं व्रतं वापि मातर्गतिस्त्वं
गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥४॥


कुकर्मी कुसङ्गी कुबुद्धिः कुदासः
कुलाचारहीनः कदाचारलीनः ।
कुदृष्टिः कुवाक्यप्रबन्धः सदाहं
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥५॥

प्रजेशं रमेशं महेशं सुरेशं
दिनेशं निशीथेश्वरं वा कदाचित् ।
न जानामि चान्यत् सदाहं शरण्ये
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥६॥

विवादे विषादे प्रमादे प्रवासे
जले चानले पर्वते शत्रुमध्ये ।
अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥७॥

अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो
महाक्षीणदीनः सदा जाड्यवक्त्रः ।
विपत्तौ प्रविष्टः प्रनष्टः सदाहं
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥८॥

--------------------------------------------------------------
५.त्रिपुरसुन्दर्यष्टकम्

त्रिपुरसुंदरी या नावाची देवीची देवळे मी पाहिली आहेत, पण तिच्या या रूपाबद्दल कुणाकडूनही विशेष कांही ऐकल्याचे आठवत नाही. तिचे हे आठ श्लोकी सुंदर स्तोत्र खाली दिले आहे.

त्रिपुरसुन्दर्यष्टकम्

कदम्बवनचारिणीं मुनिकदम्बकादम्बिनीं
नितम्बजितभूधरां सुरनितम्बिनीसॆविताम।
नवाम्बुरुहलोचनामभिनवाम्बुदश्यामलां
त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रयॆ॥१॥

कदम्बवनवासिनीं कनकवल्लकीधारिणीं
महार्हमणिहारिणीं मुखसमुल्लसद्वारुणीम।
दयाविभवकारिणीं विशदरोचनाचारिणीं
त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रयॆ॥२॥

कदम्बवनशालया कुचभरोल्लसन्मालया
कुचोपमितशैलया गुरुकृपालसद्वॆलया।
मदारुणकपोलया मधुरगीतवाचालया
कयापि घनलीलया कवचिता वयं लॆऎलया॥३॥

कदम्बवनमध्यगां कनकमण्डलोपस्थितां
षडम्बुरुहवासिनीं सततसिद्धसौदामिनीम।
विडम्बितजपारुचिं विकचचन्द्रचूडामणिं
त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रयॆ॥४॥

कुचाञ्चितविपञ्चिकां कुटिलकुन्तलालङ्कृतां
कुशॆशयनिवासिनीं कुटिलचित्तविद्वॆषिणीम।
मदारुणविलोचनां मनसिजारिसम्मोहिनीं
मतङ्गमुनिकन्यकां मधुरभाषिणीमाश्रयॆ॥५॥

 स्मरॆत्प्रथमपुष्पिणीं रुधिरमिन्दुनीलाम्बरां
गृहीतमधुपात्रिकां मदविघूर्णनॆत्राञ्चलाम।
घनस्तनभरोन्नतां गलितचूलिकां श्यामलां
त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रयॆ॥६॥


सकुङ्कुमविलॆपनामलिकचुम्बिकस्तूरिकां
समन्दहसितॆक्षणां सशरचापपाशाङ्कुशाम।
अशॆषजनमोहिनीमरुणमाल्यभूषाम्बरां
जपाकुसुमभासुरां जपविधौ स्मराम्यम्बिकाम॥७॥

 पुरंदरपुरंध्रिकाचिकुरबन्धसैरंध्रिकां
पितामहपतिव्रतापटुपटीरचर्चारताम।
मुकुन्दरमणीमणीलसदलङ्क्रियाकारिणीं
भजामि भुवनाम्बिकां सुरवधूटिकाचॆटिकाम॥८॥


---------------------------------------------------------------
४.अन्नपूर्णा स्तोत्र
ज्या घरावर अन्नपूर्णेची कृपा असते त्या घरातल्या माणसांना खाण्यापिण्याची ददात नसते, अर्थातच यात समृध्दीही आलीच आणि त्यामुळे ते घर सुखी असते. अशा अन्नपूर्णा मातेची परोपरीने स्तुति करून तिच्याकडे तिच्या कृपेची भिक्षा श्रीमद् शंकराचार्यांनी किती लीन भावनेने मागितली आहे हे वाचण्यासारखे (आणि ऐकण्यासारखेसुध्दा) आहे.

https://www.youtube.com/watch?v=Do1k7L3itxQ

।अन्नपूर्णा स्तोत्र।।

नित्यानन्दकरी वराभयकरी सौंदर्यरत्नाकरी।
निर्धूताखिल-घोरपावनकरी प्रत्यक्षमाहेश्वरी।
प्रालेयाचल-वंशपावनकरी काशीपुराधीश्वरी।
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपुर्णेश्वरी।।१।।

नानारत्न-विचित्र-भूषणकरी हेमाम्बराडम्बरी।
मुक्ताहार-विलम्बमान विलसद्वक्षोज-कुम्भान्तरी।
काश्मीराऽगुरुवासिता रुचिकरी काशीपुराधीश्वरी।
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।२।।

योगानन्दकरी रिपुक्षयकरी धर्माऽर्थनिष्ठाकरी।
चन्द्रार्कानल-भासमानलहरी त्रैलोक्यरक्षाकरी।
सर्वैश्वर्य-समस्त वांछितकरी काशीपुराधीश्वरी।
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।३।।

कैलासाचल-कन्दरालयकरी गौरी उमा शंकरी।
कौमारी निगमार्थगोचरकरी ओंकारबीजाक्षरी।
मोक्षद्वार-कपाट-पाटनकरी काशीपुराधीश्वरी।
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।४।।

दृश्याऽदृश्य-प्रभूतवाहनकरी ब्रह्माण्डभाण्डोदरी।
लीलानाटकसूत्रभेदनकरी विज्ञानदीपांकुरी।
श्री विश्वेशमन प्रसादनकरी काशीपुराधीश्वरी।
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।५।।

उर्वी सर्वजनेश्वरी भगवती माताऽन्नपूर्णेश्वरी।
वेणीनील-समान-कुन्तलहरी नित्यान्नदानेश्वरी।
सर्वानन्दकरी दृशां शुभकरी काशीपुराधीश्वरी।
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।६।।

आदिक्षान्त-समस्तवर्णनकरी शम्भोस्त्रिभावाकरी।
काश्मीरा त्रिजलेश्वरी त्रिलहरी नित्यांकुरा शर्वरी।
कामाकांक्षकरी जनोदयकरी काशीपुराधीश्वरी।
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।७।।

देवी सर्वविचित्ररत्नरचिता दाक्षायणी सुंदरी।
वामस्वादु पयोधर-प्रियकरी सौभाग्यमाहेश्वरी।
भक्ताऽभीष्टकरी दशाशुभकरी काशीपुराधीश्वरी।
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।८।।

चर्न्द्रार्कानल कोटिकोटिसदृशा चन्द्रांशुबिम्बाधरी।
चन्द्रार्काग्नि समान-कुन्तलहरी चन्द्रार्कवर्णेश्वरी।
माला पुस्तक-पाश-सांगकुशधरी काशीपुराधीश्वरी।
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।९।।

क्षत्रत्राणकरी महाऽभयकरी माता कृपासागरी।
साक्षान्मोक्षरी सदा शिवंकरी विश्वेश्वरी श्रीधरी।
दक्षाक्रन्दकरी निरामयकरी काशीपुराधीश्वरी।
भिक्षां देहि कृपावलंबनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।१०।।

अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकरप्राणवल्लभे !
ज्ञान वैराग्य-सिद्ध्‌यर्थं भिक्षां देहिं च पार्वति।।

माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः।
बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्‌ II

आदि शङ्कराचार्यविरचितम् अन्नपूर्णा स्तोत्रम्।

--------------------------------------------------------------------------------------
३. महिषासुरमर्दिनी स्तोत्रम्
महिषासुरमर्दिनी जगदंबेचे हे स्तोत्र तर सुंदर आहेच, प्रत्येक श्लोकाच्या पहिल्या ओळीत छान अनुप्रास साधला आहे. या  स्तोत्राचे वृत्त ऊर्जेने भरलेले, स्फूर्तिदायक आणि जोरकस वाटते. चालीवर म्हणून तर पहा.

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम्

अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते
गिरिवरविन्ध्यशिरोऽधिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते ।
भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १ ॥
   सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते ।
   त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते ।
   दनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते ।
   जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ २ ॥
अयि जगदम्ब मदम्ब कदम्ब वनप्रियवासिनि हासरते ।
शिखरि शिरोमणि तुङ्गहिमालय शृङ्गनिजालय मध्यगते ।
मधुमधुरे मधुकैटभगञ्जिनि कैटभभञ्जिनि रासरते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ३ ॥
   अयि शतखण्ड विखण्डितरुण्ड वितुण्डितशुण्द गजाधिपते ।
   रिपुगजगण्ड विदारणचण्ड पराक्रमशुण्ड मृगाधिपते ।
   निजभुजदण्ड निपातितखण्ड विपातितमुण्ड भटाधिपते ।
   जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ४ ॥
अयि रणदुर्मद शत्रुवधोदित दुर्धरनिर्जर शक्तिभृते ।
चतुरविचार धुरीणमहाशिव दूतकृत प्रमथाधिपते ।
दुरितदुरीह दुराशयदुर्मति दानवदुत कृतान्तमते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ५ ॥
   अयि शरणागत वैरिवधुवर वीरवराभय दायकरे ।
   त्रिभुवनमस्तक शुलविरोधि शिरोऽधिकृतामल शुलकरे ।
   दुमिदुमितामर धुन्दुभिनादमहोमुखरीकृत दिङ्मकरे ।
   जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ६ ॥
अयि निजहुङ्कृति मात्रनिराकृत धूम्रविलोचन धूम्रशते ।
समरविशोषित शोणितबीज समुद्भवशोणित बीजलते ।
शिवशिवशुम्भ निशुम्भमहाहव तर्पितभूत पिशाचरते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ७ ॥
   धनुरनुषङ्ग रणक्षणसङ्ग परिस्फुरदङ्ग नटत्कटके ।
   कनकपिशङ्ग पृषत्कनिषङ्ग रसद्भटशृङ्ग हताबटुके ।
   कृतचतुरङ्ग बलक्षितिरङ्ग घटद्बहुरङ्ग रटद्बटुके ।
   जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ८ ॥
सुरललना ततथेयि तथेयि कृताभिनयोदर नृत्यरते ।
कृत कुकुथः कुकुथो गडदादिकताल कुतूहल गानरते ।
धुधुकुट धुक्कुट धिंधिमित ध्वनि धीर मृदंग निनादरते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ९ ॥
   जय जय जप्य जयेजयशब्द परस्तुति तत्परविश्वनुते ।
   झणझणझिञ्झिमि झिङ्कृत नूपुरशिञ्जितमोहित भूतपते ।
   नटित नटार्ध नटी नट नायक नाटितनाट्य सुगानरते ।
   जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १० ॥
अयि सुमनःसुमनःसुमनः सुमनःसुमनोहरकान्तियुते ।
श्रितरजनी रजनीरजनी रजनीरजनी करवक्त्रवृते ।
सुनयनविभ्रमर भ्रमरभ्रमर भ्रमरभ्रमराधिपते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ११ ॥
   सहितमहाहव मल्लमतल्लिक मल्लितरल्लक मल्लरते ।
   विरचितवल्लिक पल्लिकमल्लिक झिल्लिकभिल्लिक वर्गवृते ।
   शितकृतफुल्ल समुल्लसितारुण तल्लजपल्लव सल्ललिते ।
   जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १२ ॥
अविरलगण्ड गलन्मदमेदुर मत्तमतङ्ग जराजपते ।
त्रिभुवनभुषण भूतकलानिधि रूपपयोनिधि राजसुते ।
अयि सुदतीजन लालसमानस मोहन मन्मथराजसुते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १३ ॥
   कमलदलामल कोमलकान्ति कलाकलितामल भाललते ।
   सकलविलास कलानिलयक्रम केलिचलत्कल हंसकुले ।
   अलिकुलसङ्कुल कुवलयमण्डल मौलिमिलद्बकुलालिकुले ।
   जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १४ ॥
करमुरलीरव वीजितकूजित लज्जितकोकिल मञ्जुमते ।
मिलितपुलिन्द मनोहरगुञ्जित रञ्जितशैल निकुञ्जगते ।
निजगणभूत महाशबरीगण सद्गुणसम्भृत केलितले ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १५ ॥
   कटितटपीत दुकूलविचित्र मयुखतिरस्कृत चन्द्ररुचे ।
   प्रणतसुरासुर मौलिमणिस्फुर दंशुलसन्नख चन्द्ररुचे ।
   जितकनकाचल मौलिमदोर्जित निर्भरकुञ्जर कुम्भकुचे ।
   जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १६ ॥
विजितसहस्रकरैक सहस्रकरैक सहस्रकरैकनुते ।
कृतसुरतारक सङ्गरतारक सङ्गरतारक सूनुसुते ।
सुरथसमाधि समानसमाधि समाधिसमाधि सुजातरते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १७ ॥
   पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योऽनुदिनं सुशिवे ।
   अयि कमले कमलानिलये कमलानिलयः स कथं न भवेत् ।
   तव पदमेव परम्पदमित्यनुशीलयतो मम किं न शिवे ।
   जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १८ ॥
कनकलसत्कलसिन्धुजलैरनुषिञ्चति तेगुणरङ्गभुवम् ।
भजति स किं न शचीकुचकुम्भतटीपरिरम्भसुखानुभवम् ।
तव चरणं शरणं करवाणि नतामरवाणि निवासि शिवम् ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १९ ॥
   तव विमलेन्दुकुलं वदनेन्दुमलं सकलं ननु कूलयते ।
   किमु पुरुहूतपुरीन्दु मुखी सुमुखीभिरसौ विमुखीक्रियते ।
   मम तु मतं शिवनामधने भवती कृपया किमुत क्रियते ।
   जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ २० ॥
अयि मयि दीन दयालुतया कृपयैव त्वया भवितव्यमुमे ।
अयि जगतो जननी कृपयासि यथासि तथानुमितासिरते ।
यदुचितमत्र भवत्युररीकुरुतादुरुतापमपाकुरुते जय जय हे ।
महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ २१ ॥

https://sa.wikisource.org/s/7w7
----------------------------------------------------------------------------------

२. देवीसुक्तम्
आदिशक्ती हे तर देवीचे रूप आहेच, पण  चेतना, क्षुधा, तृष्णा वगैरे संवेदना इतकेच नव्हे तर लज्जा, दया, क्षमा, तुष्टी  यासारख्या माणसाच्या मनात येणा-या भावना या सर्वांमध्ये देवीचे रूप पाहून तिला त्रिवार नमस्कार करा असे या सूक्तामध्ये सांगितले आहे.


अथ तन्त्रोक्तं देविसुक्तम्

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्मतां ॥१॥

रौद्राय नमो नित्यायै गौर्यै धात्र्यै नमो नमः
ज्योत्स्नायै चेन्दुरूपिण्यै सुखायै सततं नमः ॥२॥

कल्याण्यै प्रणता वृद्ध्यै सिद्ध्यै कुर्मो नमो नमः।
नैरृत्यै भूभृतां लक्ष्मै शर्वाण्यै ते नमो नमः ॥३॥

दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै
ख्यात्यै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं नमः ॥४॥

अतिसौम्यतिरौद्रायै नतास्तस्यै नमो नमः
नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नमः ॥५॥

यादेवी सर्वभूतेषू विष्णुमायेति शब्धिता।
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥६॥

यादेवी सर्वभूतेषू चेतनेत्यभिधीयते।
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥७॥

यादेवी सर्वभूतेषू बुद्धिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥८॥

यादेवी सर्वभूतेषू निद्रारूपेण संस्थिता।
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥९॥

यादेवी सर्वभूतेषू क्षुधारूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥१०॥

यादेवी सर्वभूतेषू छायारूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥११॥

यादेवी सर्वभूतेषू शक्तिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥१२॥

यादेवी सर्वभूतेषू तृष्णारूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥१३॥

यादेवी सर्वभूतेषू क्षान्तिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥१४॥

यादेवी सर्वभूतेषू जातिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥१५॥

यादेवी सर्वभूतेषू लज्जारूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥१६॥

यादेवी सर्वभूतेषू शान्तिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥१७॥

यादेवी सर्वभूतेषू श्रद्धारूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥१८॥

यादेवी सर्वभूतेषू कान्तिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥१९॥

यादेवी सर्वभूतेषू लक्ष्मीरूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥२०॥

यादेवी सर्वभूतेषू वृत्तिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥२१॥

यादेवी सर्वभूतेषू स्मृतिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥२२॥

यादेवी सर्वभूतेषू दयारूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥२३॥

यादेवी सर्वभूतेषू तुष्टिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥२४॥

यादेवी सर्वभूतेषू मातृरूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥२५॥

यादेवी सर्वभूतेषू भ्रान्तिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥२६॥

इन्द्रियाणामधिष्ठात्री भूतानां चाखिलेषु या।
भूतेषु सततं तस्यै व्याप्ति देव्यै नमो नमः ॥२७॥

चितिरूपेण या कृत्स्नमेत द्व्याप्य स्थिता जगत्
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥२८॥

स्तुतासुरैः पूर्वमभीष्ट संश्रयात्तथा
सुरेन्द्रेण दिनेषुसेविता।
करोतुसा नः शुभहेतुरीश्वरी
शुभानि भद्राण्य भिहन्तु चापदः ॥२९॥

या साम्प्रतं चोद्धतदैत्यतापितै
रस्माभिरीशाचसुरैर्नमश्यते।
याच स्मता तत्क्षण मेव हन्ति नः
सर्वा पदोभक्तिविनम्रमूर्तिभिः ॥३०॥
-----------------------------------------------------------------------

१. देव्यपराधक्षमापनस्तोत्रम्
घटस्थापना व नवरात्राच्या शुभारंभानिमित्त नमन. जगद्गुरु शंकराचार्यांनी लिहिलेले हे सुप्रसिद्ध स्तोत्र व मला त्याचा समजलेला अर्थ देत आहे. भक्ती, श्रद्धा वगैरे आपल्या जागी आहेतच, त्याशिवाय एक काव्य म्हणून पाहिले तरी त्यातील अनुप्रास, यमक, रूपक वगैरे अलंकार, छंदबद्ध तशीच भावोत्कट शब्दरचना मंत्रमुग्ध करणारी आहे असे मला वाटते.

देव्यपराधक्षमापनस्तोत्रम्

न मंत्रं नो यंत्रं तदपि च न जानी स्तुतिमहो।
न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथा।।
न जाने मुद्रीस्ते तदपि च न जाने विलपनं।
परं जाने मातस्त्व दनुसरणं क्लेशहरणं।।१।।
हे माते, मी मंत्रही जाणत नाही आणि तंत्रही. मला स्तुती करणे येत नाही, आवाहन आणि ध्यान य़ांची माहिती नाही. स्तोत्र व कथा मला ठाऊक नाहीत, मला तुझ्या मुद्रा समजत नाहीत आणि व्याकुळ होऊन हंबरडाही फोडणे येत नाही. पण मला फक्त एक गोष्ट समजते ती म्हणजे तुझे अनुसरण करणे. तुला शरण येण्यामुळेच सर्व संकटांचा नाश होतो.
विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया।
विधेयाशक्यत्वात्तव चरणयोर्याच्युतिरभूत।।
तदेतत्क्षंतव्यं जननि सकलोध्दारिणिशिवे।
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती।।२।।
हे सर्वांचा उध्दार करणारे माते, मला पूजाविधी माहीत नाही, माझ्याकडे संपत्ती नाही, मी स्वभावानेच आळशी आहे आणि तुझी व्यवस्थित प्रकारे पूजा करणे मला शक्य नाही. या सगळ्या कारणांमुळे तुझ्या चरणी सेवा करण्यात ज्या तृटी येतील त्याबद्दल मला क्षमा कर, कारण वाईट मुलगा जन्माला येणे शक्य आहे पण आई कधीच वाईट होऊ शकत नाही.
पृथीव्यां पुत्रास्ते जननि वहवः सन्ति निरलाः।
परं तेषांमध्ये विरलतरलोSहं तव सुतः।।
मदीयोSयं त्यागः सनुचितमिदं नो तव शिवे।
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।३।।
माते, या पृथ्वीवर तुझे पुष्कळ साधेसुधे पुत्र आहेत पण मी त्या सर्वांमधील अत्यंत अवखळ बालक आहे. माझ्यासारखा चंचल मुलगा क्वचितच असेल. तरीही तू माझा त्याग करणे हे कधीही योग्य ठरणार नाही. कारण कुपुत्र होणे शक्य असले तरी कुमाता होणे शक्य नाही.
जगन्मातर्मातस्तव चरणसेवा न रचिता।
न वा दत्तं देवी द्रविणमपि भूयस्तव मया।।
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे।
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती।।४।।
हे जगदंबे देवी माते, मी कधीही तुझ्या चरणांची सेवा केली नाही, तुला फारसे धन समर्पण केले नाही, तरीही तू माझ्यासारख्या अधम माणसावर अनुपम स्नेह करतेस कारण या जगात मुलगा वाईट होऊ शकतो पण आई कधीही वाईट बनू शकत नाही.
परित्यक्ता देवा विविधविधि सेवा कुलतया।
मया पंचाशीते रधिकमपनीते तु वयसि।।
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भवता।
निरालंबोलंबोदरजननि कं यामि शरणं।।५।।
हे गणपतीला जन्म देणा-या पार्वतीमाते, इतर अनेक देवतांची विविध प्रकाराने सेवा करण्यात मी व्यग्र होतो. पंचाऐंशीचा झाल्यानंतर आता माझ्याच्याने ते होत नाही म्हणून मी त्या सर्व देवांना सोडून दिले आहे व त्यांच्या मदतीची आशा उरलेली नाही. या वेळी मला जर तुझी कृपा मिळाली नाही तर मी निराधार होऊन कुणाला शरण जाऊ?
श्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा।
निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकै।।
तवापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं।
जनःको जानीते जननि जपनीयं जपविधौ।।६।।
हे अपर्णामाते, तुझ्या मंत्राचे एक अक्षर जरी कानावर पडले तरी मूर्ख माणूससुध्दा मधुपाकासारखे मधुर बोलणारा उत्तम वक्ता होतो, दरिद्री माणूस कोट्यावधी सुवर्णमुद्रा मिळून चिरकाल निर्भर होऊन विहार करतो. तुझ्या मंत्राचे एक अक्षर ऐकण्याचे एवढे मोठे फळ आहे तर जे लोक विधीवत् तुझा जप करतात त्यांना काय मिळत असेल हे कोण जाणेल?
चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो।
जटाधारीकण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः।।
कपाली भूतेशो भजति जगदीशै क पदवीम्।
भवानी त्वत्प्राणिग्रहण परिपाटी फलमिदम्।।७।।
जो आपल्या अंगाला चितेची राख फासतो, विष खातो, दिगंबर राहतो, डोक्यावर जटा वाढवतो, गळ्यात सांप धारण करतो, हातात (भिक्षेचे) कपालपात्र धरतो, अशा भुतांच्या व पशूंच्या नाथाला जगदीश ही पदवी कशामुळे दिली जाते? हे भवानी, अर्थातच तुझे पाणिग्रहण (तुझ्याशी विवाह) केल्याचेच हे फळ त्याला मिळाले असणार.
न मोक्षस्याकाङ्क्षा भवविभववांच्छापि च न मे।
न विज्ञानापेक्षा शशिमुख सुखेच्छापि न पुनः।।
अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै।
मृडानी रुद्राणी शिवशिवभवानीति जपतः।।८।।
मला मोक्ष मिळवण्याची इच्छा नाही, जगातील वैभवाची अभिलाषा नाही, विज्ञानाची अपेक्षा नाही, सुखाची आकांक्षा नाही. हे चन्द्रमुखी माते, तुझ्याकडे माझे एवढेच मागणे आहे की माझा जन्म मृडानी रुद्राणी शिवशिवभवानी या तुझ्या नामांचा जप करण्यात व्यतीत होवो.
नाराधितासि विधिना विविधोपचारैः।
किं रुक्षचिन्तन परैर्न कृतं वचोमि।
श्यामे त्वमेव यदि किंचन मय्यनाये।
धत्से कृपामुचितमम्ब परे तवैव।।९।।
नाना प्रकारच्या पूजा सामुग्रीद्वारे तुझी विधिवत् पूजा माझ्याकडून घडली नाही. नेहमी रूक्ष चिंतन करणा-या माझ्या वाचेने कोणकोणते अपराध केले नसतील? हे श्यामा माते, तरीही तू स्वतः प्रसन्न होऊन माझ्यासारख्या अनाथावर थोडीशी कृपा करतेस हे तुझ्या योग्यच आहे.
आपत्सु मग्नः स्मरणं त्वदीयं करोमि दुर्गे करुणार्णवेशि।।
नैतच्छठत्वं मम भावमेथाः क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ति।।१०।।
करुणेचा सागर अशा माता दुर्गे, संकटात सापडल्यानंतर मी तुझे स्मरण करीत आहे. (आधी केले नाही) पण ही माझी शठता आहे असे मानू नकोस कारण तहान भूक लागल्यावरच मुलाला आईची आठवण येते.
जगदम्ब विचित्रमय किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयी।
अपराध परंपरा परं न हि माता समुपेक्षते सुतम्।।११।।
हे जगदम्बे, माझ्यावर तुझी पूर्ण कृपा आहे हे आश्चर्य आहे मुलगा अपराधावर अपराध करीत गेला तरी माता कधीही त्याची उपेक्षा करीत नाही.
मत्समः पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि।
एवम् ज्ञाता महादेवी यथा योग्यं तथा कुरु।।१२।।
हे महादेवी, माझ्यासारखा पापी कोणी नाही आणि तुझ्यासारखी पापाचा नाश करणारी कोणी नाही हे जाणून तुला जे योग्य वाटेल ते कर.
---------------------------------------------------------
मराठी अनुवाद करतांना मी माहितीजालावर मिळालेल्या कांही हिंदी व इंग्रजी भाषांतरांचा उपयोग करून घेतला आहे. मी स्वतः कधीच संस्कृत किंवा धर्मशास्त्रे शिकलेलो नसल्याने त्यामधून कदाचित मूळ संस्कृतमध्ये अभिप्रेत नसलेले शब्द किंवा अर्थ आले असण्याची शक्यता आहे. पण माझ्या कल्पनेप्रमाणे तपशीलात न जाता स्तुतीमधला एकंदर भाव मला बरोबरच समजला आहे असे मला वाटते.