Wednesday, December 26, 2012

आपल्या रक्तात काय काय असते? रक्ताची तपासणी

आपल्या रक्तात काय काय असते?  - भाग १

माणसाचे आईवडील, बहीणभाऊ आणि मुले यांच्याबरोबर असलेले नाते रक्ताचे नाते असते. आनुवंशिकतेमधून त्यांच्यात काही समान गुण आलेले दिसतात. त्याची शरीरयष्टी, बुध्दीमत्ता, स्वभाव, हावभाव वगैरे गोष्टी त्याला जीन्समधून मिळाल्या आहेत असे सांगतात. "ते त्याच्या रक्तातच आहे" असेही अलंकारिक भाषेत म्हंटले जाते. संस्कारातून मिळालेले किंवा प्रशिक्षणातून अंगात बाणवलेले गुणसुध्दा "रक्तात भिनले आहेत" असे म्हंटले जाते.  प्रेमळ, शांत, धीरगंभीर वृत्ती, वाक्चातुर्य, खंबीरपणा, निर्भयता, धडाडी, निर्भीडपणा, विनय यासारखे चांगले गुण किंवा हटवाद, अरेरावी, धांदरटपणा, धरसोड, घाई, कचखाऊपणा, बुजरेपणा, विघ्नसंतोषी वृत्ती यासारखे दुर्गुण कुणाकुणाच्या रक्तातच आहेत असे म्हंटले जाते. माणसाच्या रक्तात खरोखर काय काय असते आणि ते किती प्रमाणात असते हे आजकाल होत असलेल्या शास्त्रीय तपासण्यांमधून पाहिले आणि मोजले जाते. माणसाच्या रक्तात खरोखर काय काय असते आणि ते किती प्रमाणात असते हे आजकाल होत असलेल्या शास्त्रीय तपासण्यांमधून पाहिले आणि मोजले जाते.

ठेच लागणे, खरचटणे वगैरे गोष्टी लहान असतांना रोजच घडायच्या आणि त्यामुळे शरीराच्या कुठल्याही भागात झालेल्या जखमेमधून लालभडक रंगाचे रक्त बाहेर पडते एवढी माहिती आपोआपच कळत गेली. शरीरात सर्वत्र असलेले हे रक्त कुठेही स्थिर नसते, शरीराच्या सगळ्या भागांमधून ते सारखे हृदयाकडे जात असते आणि तिकडून फुफ्फुसात जाऊन तिथे शुध्द होऊन हृदयात परत येते आणि त्यानंतर ते पुन्हा शरीरभर पसरते या क्रियेला 'रक्ताभिसरण' म्हणतात ही माहिती शालेय शिक्षणात मिळाली. त्याच बरोबर रक्तामध्ये तांबड्या आणि पांढऱ्या पेशी असतात वगैरेही समजले.

माझ्या लहानपणी आमच्या लहान गावात पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी नव्हती. बहुतेक लोकांनी हे शब्दच मुळी ऐकले नव्हते. तिथले डॉक्टर लक्षणे पाहूनच रोगाची चिकित्सा आणि उपचार करायचे. आमच्या घरातले कोणीही रक्त तपासून घेण्यासाठी मोठ्या शहरातल्या दवाखान्यात गेले होते असे मी लहानपणी कधी ऐकले नाही. मला नोकरीला लागल्यानंतर आमची वैद्यकीय तपासणी झाली त्या वेळी माझ्या रक्ताची पहिली चाचणी झाली. त्याचा रिपोर्ट मला मिळालाच नाही, पण माझी नोकरी शाबूत राहिली म्हणजे त्यात काही आक्षेपार्ह असे सापडले नसणार.

आम्ही अणुशक्तीनगरला रहायला गेलो तेंव्हा तिथे एक सुसज्ज असे हॉस्पिटल बांधले गेले होते. त्यात पॅथॉलॉजीचा सेक्शनसुध्दा होता. घरातल्या कोणाला अचानक सडकून ताप भरला किंवा कोणाला आलेला ताप, खोकला वगैरे रेंगाळत राहिले तर त्याच्या रक्ताची तपासणी केली जाई, पण तो रिपोर्ट थेट आमच्या फायलीत जाई आणि तो वाचण्याची परवानगी फक्त डॉक्टरांनाच होती. त्या तपासणीमध्ये कुठल्या रोगाचे जंतू मिळतात ते पाहिले जात असेल असे सुरुवातीला मला वाटायचे. का कोणास ठाऊक पण पूर्वीच्या काळात आमच्या रक्ताच्या तपासणीचा रिपोर्ट आम्हाला पहायलाही मिळत नसे. एकाद्या ओळखीच्या डॉक्टरने मोठी मेहेरबानी करून तो दाखवलाच तरी बीएसएफ, पीपी, पीसी असली अक्षरे आणि त्यांच्या समोर लिहिलेले आकडे यांमधून काही बोध होत नसे आणि तो समजावून सांगणे हा डॉक्टरच्या ड्यूटीचा भाग नव्हता. पण ही अक्षरे जंतूबिंतूंची नावे असणार नाहीत असे मात्र वाटायचे.

चाळिशीत आल्यानंतर एकदा मी अलकाला घेऊन आमच्या दवाखान्यात गेलो होतो. तिला तपासल्यानंतर डॉक्टरांनी एक चिटोरे आमच्या हातात दिले आणि पॅथॉलॉजीमध्ये जाऊन रक्ताचे सँपल देऊन यायला सांगितले. त्यानंतर माझ्या किंचित स्थूलपणाकडे झुकलेल्या देहाकडे पहात मला विचारले, "तुमच्या बॉडीची केमिस्ट्री कशी आहे?"
माझ्या तोंडावरले प्रश्नचिन्ह पाहून विचारले, "तुमची लेटेस्ट ब्लडटेस्ट कधी झाली आहे?"
मी सांगितले, "मला तर आठवत नाही. तुम्ही जरा फाइलमध्ये बघा."
त्यांनी चारपाच पाने चाळून पाहिली, त्यात काही सापडले नाही हे पाहून आणखी एक चिटोरे लिहून माझ्या हातात दिले आणि अलकाबरोबर माझ्या रक्ताचेही सँपल देऊन यायला सांगितले.

मी धडधाकट असतांना दिलेल्या रक्तात डॉक्टरांना काय सापडणार आहे असाच विचार करत दोन दिवसांनी पुन्हा त्यांना भेटायला गेलो. माझा रिपोर्ट पाहून ते एकदम म्हणाले, "तुम्हाला आता आपल्या आहाराकडे लक्ष द्यायला हवे आणि नियमितपणे थोडा व्यायामही करायला पाहिजे."

मी म्हंटले, "हे तर सगळेच सांगतात. मी सुध्दा इतर लोकांना सांगतो. या रिपोर्टवरून तुम्हाला हे सांगावंसं का वाटलं?"
"कारण तुमच्या रक्तातलं साखर आणि कोलेस्टेरॉलचं प्रमाण लिमिटच्या बाहेर गेलं आहे."
"पण मला तर तसं काही वेगळं जाणवत नाही. खरं तर मला कसला म्हणजे कसलाच त्रास होत नाही."
"या दोघांचंही असंच असतं. जोपर्यंत त्यांची लक्षणं स्पष्टपणे दिसायला लागतात तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. सुदैवाने तुम्हाला एक वॉर्निंग लवकर मिळाली आहे. आताच प्रयत्न केलात तर त्यांना आटोक्यात आणता येईल."

डॉक्टरांचा सल्ला मनावर घेऊन मी तोंडावर शक्य तेवढा ताबा ठेवायला आणि जमतील तेवढे हातपाय हलवायला सुरुवात केली. महिनाभरानंतर पुन्हा रक्त तपासून घेतले तेंव्हा दोन्हींचे प्रमाण मर्यादेच्या आत आले होते, पण ते सीमारेषेच्या जवळच असल्यामुळे पथ्य आणि व्यायाम हे दोन्ही चालू ठेवणे भार पडले ते कायमचे. त्या घटनेच्या आधीसुध्दा वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर रक्ततपासणीबद्दल माहिती येत असे, पण मी तिकडे लक्ष देत नव्हतो. त्यानंतर मात्र मी लक्ष देऊन ती माहिती वाचायला लागलो. त्यातून बऱ्याच गोष्टी समजत गेल्या. त्या थोडक्यात देण्याचा हा एक प्रयत्न आहे.

आपला श्वासोच्छवास, रक्ताभिसरण, शरीराचे ठराविक तपमान राखणे, झालेली झीज भरून काढणे वगैरे शरीरातली महत्वाची कामे दिवसाचे चोवीस तास अव्याहत चालली असतात. त्यासाठी ऊर्जा आणि कच्चा माल यांचीसुध्दा सतत आवश्यकता असते. यांचा पुरवठा आपल्या अन्नामधून होतो, पण आपण ते दिवसातून दोन तीन वेळाच खातो. त्या वेळी खाल्लेल्या अन्नाचे पचन झाल्यानंतर त्याचा रस रक्तात जातो आणि त्यातला थोडा भाग खर्च होऊन उरलेला रस शरीरातच निरनिराळ्या जागी साठवून ठेवला जातो. अन्नाचे पचन होऊन गेल्यानंतरच्या काळात हा रस तिथून पुन्हा रक्तात प्रवेश करतो आणि त्याच्या सहाय्याने शरीराच्या सर्व भागामधल्या सर्व अवयवांना पुरवला जातो. अशा प्रकारे अन्नरसाचा काही भाग नेहमीच रक्तात असतो. विशेषतः साखर, मीठ यासारखे रासायनिक पदार्थ रक्तात विरघळलेले असतातच. त्यांचे प्रमाण किमान आणि कमाल मर्यादांमध्ये ठेवण्याचे काम शरीरातल्या अनेक ग्रंथी मिळून बिनबोभाटपणे करत असतात. काही कारणामुळे त्यांचे संतुलन बिघडले तर मात्र ते प्रमाण लिमिटच्या बाहेर गेले आणि बराच काळ राहिले तर त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊन अनेक व्याधी जडतात. रक्तामधली साखर किंवा कोलेस्टेरॉल यांचा समावेश त्यातच होतो. हे आणि आणखी काय काय रक्तात असते आणि त्यासाठी तपासणी केली जाते हे पुढे पाहू.

.  . . . . . .  . . . . . .

आपल्या रक्तात काय काय असते?  - भाग २


भरपूर पाण्यात घालून शिजवलेल्या डाळीमध्ये तिखट, मीठ, मसाले, चिंच, गूळ वगैरे घालून त्यावर फोडणी देऊन आमटी बनवतात. या पाककृतीत टाकलेली काही द्रव्ये आमटीतल्या पाण्यात विरघळतात तर काही विरघळत नाहीत. तिचा समरस असा (होमोजिनियस) एकजीव पदार्थ होत नाही. रसायनशास्त्रानुसार आमटी हे एक संयुग (कॉम्पाउंड) नसते, ते एक मिश्रण (मिक्स्चर) असते. त्याचप्रमाणे रक्त हेसुध्दा अनेक घटकांचे मिश्रण असते. शिवाय पचन झालेल्या अन्नरसाचे मिश्रण त्यात मिसळते, तसेच शरीरामधील निरनिराळ्या ग्रंथींमधून निघालेले श्रावसुध्दा त्यात मिसळतात. शरीराला नको असलेली द्रव्ये रक्तामधूनच मूत्रपिंड (किडनी) आणि त्वचेमधील घर्मपिंडात जातात आणि तिथे ती रक्तामधून बाहेर काढली जाऊन लघवी व घामाद्वारे उत्सर्जित केली जातात. ही सारी द्रव्ये रक्तात मिसळलेली असली तरी त्यांच्या गुणधर्मावरून त्यांना ओळखणे आणि त्यांचे प्रमाण मोजणे शक्य असते. रक्ताच्या तपासणी (ब्लड टेस्टिंग)मध्ये हे काम केले जाते. अर्थातच या विविध द्रव्यांसाठी निरनिराळ्या प्रकारांच्या तपासण्या कराव्या लागतात. त्यातल्या काही मुख्य तपासण्यांबद्दल मला असलेली माहिती या लेखात दिली आहे. मी वैद्यकशास्त्राचा अभ्यास केलेला नाही. मी स्वतः आणि माझे कुटुंबीय यांना आलेला अनुभव आणि वाचनात आलेली माहिती या आधारावर हे लिहिले आहे.

१.पृथक्करणः (सीबीसी) रक्तामधील मुख्य घटकांची मोजणी या ब्ल़डकाउंटमध्ये करतात. ते असे असतात.
 तांबड्या पेशीः रक्तातला हा सर्वात मोठा घटक श्वासामधून फुफ्फुसात घेतलेल्या हवेतला प्राणवायू (ऑक्सीजन) शोषून घेऊन तो शरीरातल्या सर्व पेशींना पुरवतो आणि शरीरात निर्माण झालेला कर्बद्विप्राणील (कार्बन डायॉक्साइड) वायू गोळा करून त्याला फुफ्फुसांपर्यंत नेऊन पोचवतो. तांबड्या पेशींमधला हिमोग्लोबिन नावाचा घटक हे काम करत असतो. तांबड्या पेशींची आणि त्यांच्यातल्या हिमोग्लोबिनची संख्या कमी झाली तर शरीराला आवश्यक तेवढा प्राणवायू मिळत नाही. त्यामुळे सारीच इंद्रिये अशक्त होतात.

पांढऱ्या पेशीः आपल्या शरीरात शिरलेल्या रोगजंतूंचा सामना करून त्यांना नष्ट करतात. यांची संख्या आवश्यकतेनुसार वाढते. त्यांचे प्रमाण थोडे वाढलेले तपासणीमध्ये दिसले तर याचा अर्थ आपल्या शरीरात काही रोगजेतूंनी मुक्काम ठोकला आहे असा होतो. ते प्रमाण नीचांकाहूनही कमी झाले तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

प्लेटलेट्सः रक्तवाहिनीला इजा झाली आणि त्यामधून रक्त बाहेर आले तर त्यातल्या प्लेटलेट्स लगेच गोठतात आणि एक जाळे तयार करून रक्ताची गुठळी बनवतात. त्यामुळे रक्तवाहिनीच्या फुटलेल्या भागावर एक बूच बसते आणि ते आतल्या रक्ताला बाहेर येण्यास प्रतिबंध करते अशा प्रकारे त्या जखमेमधून होणारा रक्तस्त्राव आपोआप थांबतो. अशा प्रकारे आपला बचाव करणारा रक्तातला हा आणखी एक घटक आहे. त्यांची संख्या कमी झाली तर अगदी किरकोळ जखमांमधून किंवा साध्या खरचटण्यामधूनसुध्दा शरीरातले रक्त भळाभळा वहात राहू शकते.

इलेक्ट्रोलाईट्सः सोडियम, पोटॅशियम, क्लोरिन यासारखी काही मूलद्रव्ये शरीरामधील विविध इंद्रियांच्या कामासाठी आवश्यक असतात. या तपासणीत ते मोजले जातात.
वरील तीन्ही घटकांच्या ब्लडकाउंटवरून रोग्याच्या शरीराच्या धडधाकटपणाचा अंदाज येतो, तसेच अॅनिमियासारख्या काही विकारांची माहिती मिळते. यामधील कोठलाही घटक प्रमाणापेक्षा खूप जास्त असणेही चांगले नसते. ते एकाद्या दुर्धर रोगाचे लक्षण असू शकते.

२.साखरेचे प्रमाणः  आजकाल मधुमेह या विकाराचे प्रमाण वाढले आहे आणि ते वाढतच आहे. आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन झाल्यानंतर त्यामधील कार्बोहैड्रेट्सचे साखरेत रूपांतर होते. या साखरेचे प्राणवायूशी संपर्क आल्यावर ज्वलन होऊन त्यामधून ऊर्जा तयार होते. ही क्रिया होण्यासाठी इन्सुलिन या हार्मोनची गरज असते. मधुमेह झाल्यास शरीरातले इन्सुलिनचे उत्पादन कमी होते, पुरेसे इन्सुलिन उपलब्ध नसले तर साखरेचे पुरेसे ज्वलन होत नाही आणि त्यामुळे रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढत जाते. साखरेचे हे प्रमाण सारखे बदलत असल्यामुळे ते मोजून त्या आकड्याची तुलना करण्यासाठी काही संदर्भ वेळ असणे आवश्यक असते. यासाठी दोन वेळा निश्चित केल्या आहेत.

फास्टिंग ब्लड शुगरः रात्रीचे जेवण करून झोपल्यानंतर आपण खाल्लेल्या सर्व अन्नाचे रात्रभरात पचन होऊन त्यातली साखर यकृतात साठवली जाते आणि त्यानंतर ती यकृतामधून परत घेऊन तिचा उपयोग करणे चाललेले असते. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी रक्ताची तपासणी केल्यास या परिस्थितीमधले प्रमाण समजते. निरोगी माणसाच्या रक्तात हे प्रमाण सुमारे ६० ते १०० च्या दरम्यान असते.

पोस्ट प्रॉन्डियलः सकाळचा नाश्ता किंवा दुपारचे जेवण केल्यानंतर बरोबर दोन तासांनी रक्ताचे सँपल घेऊन ही चाचणी करतात. सर्वसाधारण निरोगी माणसाच्या रक्तामधल्या साखरेचे प्रमाण एवढ्या वेळात पूर्वस्थितीवर आलेले असते. पण काही व्यक्तींच्या बाबतीत कदाचित येत नाही. सामान्य माणसासाठी हे प्रमाण सुमारे ८० ते १२० आणि मधुमेहींसाठी १४० पर्यंत ठीक समजले जाते.
आजकाल शर्करा तपासण्यासाठी पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये जाऊन रक्त काढून द्यावे लागत नाही. मुठीत मावू शकेल एवढे छोटेसे ग्ल्युकोमीटर वापरून आपण ही तपासणी घरच्या घरीसुध्दा करू शकतो. यात मिळणारे आकडे अगदी अचूक नसले तरी साधारण कल्पना येण्यासाठी ठीक असतात. रोज इन्सुलिनचे इन्जेक्शन घेणारे मधुमेहाचे काही रुग्ण या शोधामुळे आता ही तपासणी भोजनाच्या आधी करून त्यानुसार डोस ठरवतात.

ग्लायकोनेटे़ड हिमोग्लोबिनः या तपासणीमध्ये मागील तीन महिन्यातील साखरेच्या प्रमाणाची सरासरी समजते. वर दिलेल्या दोन वेळा सोडून इतर काळामध्येसुध्दा साखरेचे प्रमाण कमीजास्त होत असते. त्याचा प्रभाव समजून घेण्यासाठी अधून मधून ही तपासणी करून घेऊन उपचाराची दिशा ठरवली जाते.
 
३. क्लोरेस्टेरॉलः आपण खाल्लेले स्निग्ध पदार्थ कोलेस्टेरॉलच्या रूपाने रक्तात मिसळतात. लो डेन्सिटी. हाय डेंन्सिटी यासारखे त्याचे काही प्रकार आहेत. लिपिड प्रोफाईल नावाच्या ब्लडटेस्टमध्ये त्यांचा संपूर्ण आलेख मिळतो. पक्षघात आणि हृदयरोगाच्या दृष्टीने याला खूप महत्व आले आहे.

४. लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन, थाइरॉईड टेस्ट वगैरेः अशा प्रकारच्या तपासण्यांमध्ये रक्तात असलेली या इंद्रियांशी संबंधित रसायने किंवा स्त्राव यांची मोजणी करून त्यांचे प्रमाण दाखवले जाते. त्यावरून ही खास इंद्रिये किती चांगले काम करत आहेत किंवा बिघडली आहेत याचा अंदाज घेतला जातो.

५. पीटीः या तपासणीत रक्त गोठण्यासाठी किती वेळ लागतो आणि लागणे अपेक्षित आहे हे मोजले जाते आणि त्यांची तुलना केली जाते. पक्षघात आणि हृदयरोगाच्या उपचाराच्या दृष्टीने याला खूप महत्व आले आहे.

६. ब्लड टाईपः ए, बी, एबी, ओ आणि आरएच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असे रक्ताचे गट केलेले आहेत. रोग्याला दुसऱ्या माणसाचे रक्त द्यायचे असल्यास हा गट बघून घ्यावा लागतो. चुकीच्या गटाचे रक्त दिल्यास रोग्याचे शरीर त्या रक्ताचा स्वीकार करत नाही, त्यामुळे उपायाऐवजी अपाय होऊ शकतो.

७. एलिसाः ही टेस्ट एड्स हा आजार ओळखण्यासाठी असते. आजकाल या आजाराने थैमान घातले असल्यामुळे रोग्याला दिलेल्या रक्तात या आजाराचे विषाणू नाहीत याची खात्री करून घेणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे ज्या रोग्याचे ऑपरेशन करायचे आहे त्यालासुध्दा या आजाराची लागण झालेली नाही हे पाहून घेणे योग्य असते.

८. ब्लड गॅसेसः या तपासणीसाठी थेट हृदयामधून आलेले रक्त रुग्णाच्या  रोहिणी (आर्टरी) मधून काढून त्यातील प्राणवायू, कार्बन डायॉक्साईड वायू वगैरेंचे प्रमाण मोजतात. फुफ्फुसांची कार्यक्षमता यावरून पाहिली जाते.

९. ब्लड कल्चरः रक्तामधील रोगजंतूंना पोषक अशा वातावरणात वाढवून सूक्ष्मदर्शक यंत्राखाली त्यांचे निरीक्षण केले जाते. रोग्याला कोणत्या जंतूंचा संसर्ग झाला आहे आणि कोणती औषधे त्यांना मारक आहेत हे या तपासणीत समजते.

१० डीएनए टेस्टः मुलगा वा मुलगी आणि त्यांचे माता पिता यांचा रक्ताचा संबंध या तपासणीतून सिध्द करता येतो. प्रत्यक्ष जीवनापेक्षा नाटक, सिनेमे, टीव्हीवरील सीरियल्स यांमध्येच ही टेस्ट अनेक वेळा दाखवतात.
 

Friday, December 14, 2012

बाराचा महिमा आणि .... भाव

मुलाचा जन्म झाल्यापासून बारावे दिवशी त्याचे बारसे करतात. बाराव्या दिवशी त्याचे नामकरण करण्यासाठी मुहूर्त पहावा लागत नाही म्हणून त्या दिवशी बारशाचा समारंभ करतात असे म्हणतात. आतासारखी सगळ्या प्रकारच्या मुहूर्तांची माहिती देणारी जाडजूड छापील पंचांगे पूर्वीच्या काळात मिळत नसत. ज्योतिषविद्या जाणणा-या कोणा विद्वानाने आधी बाळाची जन्मतिथी, वेळ, प्रहर वगैरे पाहून त्याची पत्रिका तयार करायची आणि त्यातली राहू, केतू, शनि, मंगळ वगैरेंची स्थाने पाहून त्याच्या कुठल्याही शुभकार्यासाठी मुहूर्त काढायचा हे जरा अवघड असेल.
नुकतेच जन्माला आलेले बाळ फारच नाजुक असते आणि त्याची आईसुध्दा अशक्त झालेली असते. त्यांच्याकडे सगळे लक्ष पुरवून त्यांना संपूर्ण विश्रांती देणे अत्यंत आवश्यक असते, शिवाय त्या वेळेस जंतुसंसर्गाचा धोका जास्त आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे ते टाळणे गरजेचे असते. अशा कारणांमुळे घरात कुठल्याच प्रकारच्या समारंभाची धांदल असणे उचित नसते. पूर्वीच्या काळात घरात नवीन मूल जन्माला आल्यास सोयर पाळले जात असे. चार दिवस निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर पाचवे दिवशी त्या बाळासाठी जिवतीमातेची पूजा केली जात असे. यावरूनच "अगदी सुरुवातीपासून असलेली गोष्ट" या अर्थाने 'पाचवीला पूजलेली' हा वाक्प्रचार पडला. त्यानंतर आणखी आठवडाभराने बारशाचा समारंभ केला जात असे. तोपर्यंत बहुतेक बाळे आणि बाळंतिणींच्या तब्येती सुरळीत झालेल्या असत. त्यांच्या सगळ्या वैद्यकीय तपासण्या करून त्यांना फिटनेस सर्टिफिकेट देऊ शकणारे डॉक्टर त्या काळात नसायचे. बहुतेत लोकांच्या  अनुभवावरून बाराव्या दिवशी बारसे करण्याची प्रथा पडली. बारा हा आकडा अशा प्रकारे जन्मापासूनच आपल्या जीवनात येतो.

पुढे त्या बाळाचा दर महिन्याला वाढदिवस होत राहतो. असे बारा महिने झाल्यावर मासिक वाढदिवस थांबतात आणि वार्षिक सुरू होतात. आकाशातल्या सूर्य आणि चंद्र यांच्या निरीक्षणामधून वर्ष आणि महिने यांच्या द्वारे कालगणना करणे सुरू झाले. त्यामुळे एका वर्षात बारा महिने असणे हे सूर्यचंद्रांनी ठरवले. बहुधा त्यावरून प्रेरणा घेऊन आकाशामधील तारकापुंजांचे बारा गट करून आकाशगोलाची बारा राशींमध्ये विभागणी करण्यात आली. दिवस आणि रात्र यांचेही बारा बारा भाग करून दिवसाची विभागणी चोवीस तासांमध्ये केली गेली. एकपासून चोवीसपर्यंतचे इतके सगळे आकडे पटकन समजणे आणि लक्षात ठेवणे थोडे कठीण असल्यामुळे घड्याळांच्या डायलची रचना करतांना त्यात फक्त बाराच तास दाखवले गेले. दिवस आणि रात्र यांच्यातला फरक उघड असल्यामुळे घड्याळात पाहून अकरा किंवा चार वाजलेले दिसले तर त्या वेळी ते दिवसाचे की रात्रीचे हे सांगण्याची सहसा गरज नसते. आपले जीवन आजकाल घड्याळाशी बांधले गेले आहे आणि त्यातला बाराचा आकडा सारखा आपल्या नजरेसमोर येत राहतो.

माझ्या लहानपणी प्राथमिक शालेय शिक्षण हे अक्षरे आणि अंक यांच्या ओळखीपासून सुरू होऊन त्यातच बराच काळ रेंगाळत असे. आधी अक्षरे, शब्द, वाक्यरचना वगैरेंमधून भाषा साधारणपणे समजायला लागल्यानंतर त्या भाषेतून इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान यासारखे विषय शिकवावेत असा विचार त्यात होता आणि माझ्या मते तो बरोबर होता. अक्षरओळखीमध्ये अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः हे बारा स्वर आणि कखगघङ पासून षसहळक्षज्ञ पर्यंत सगळी व्यंजने शिकून झाल्यावर ककाकिकीकुकूकेकैकोकौकंकः ही बाराखडी आणि त्यानंतर किंवा तिच्या सोबतीने ख ग घ वगैरे इतर व्यंजनांच्या बाराखड्या गिरवल्या जात. निदान दोन वर्षे तरी मी स्लेटच्या पाटीवर सगळ्या बाराखड्या गिरवल्या आहेत. या बाराखड्या गिरवून गिरवून त्यातील प्रत्येक अक्षराचा आकार डोळ्यात बसला की कोठलाही शब्द पटकन वाचता किंवा लिहिता येतो. त्यानंतर अर्थ समजो वा न समजो, कुठलेही वाक्य, उतारा किंवा पान वाचायला अडचण येत नाही. बाराखड्यांच्या गिरवण्यामधून बारा हा शब्द आणि अंक मनावर खोलवर खोदला गेला.  


इंग्रज लोकांना बारा हा आकडा फारच आवडत असावा. आता त्यांनीही दशमान पध्दत अंगिकारली असली तरी त्यांच्या पूर्वीच्या चलनात १२ पेन्स म्हणजे एक शिलिंग असायचा. त्यावरूनच त्यांनी भारतात सुरू केलेल्या चलनात सुध्दा बारा पै म्हणजे एक आणा असायचा. पै या नाण्याचा उपयोग माझ्या आजोबांच्या काळात होत असे. आता पै हे फक्त एक आडनाव राहिले आहे. लांबीरुंदी मोजण्यासाठी असलेल्या परिमाणात बारा इंचांचा एक फूट असतो. आता इग्रजांनी मेट्रिक पध्दत स्वीकारली असली तरी अमेरिकन लोक अजून फूटपट्ट्या वापरतात. अजूनही सगळीकडे बारा नगांना एक डझन म्हणतात. होमिओपाथी या चिकित्सापध्दतीत बारा मुख्य क्षार असतात.

आपल्या पूर्वजांनाही बारा आकडा आवडत असे. देशभरात शंकराची लक्षावधी देवळे असतील, पण त्यातली बारा ज्योतीर्लिंगे प्रसिध्द आहेत आणि सर्वाधिक पवित्र व जागृत देवस्थाने मानली जातात. सूर्याच्या बारा नावांनी त्याला बारा सूर्यनमस्कार घालतात. गणपतीच्या बारा नावांची दोन स्तोत्रे आहेत. अनेक गावांची नावे बारा या शब्दापासून तयार झालेली आहेत, जसे महाराष्ट्रात बारामती, उत्तर भारतात बाराबंकी आणि काश्मीरात बारामुल्ला. आणखीही असतील, पण ही तीम गावे बातम्यांमध्ये येत असतात.

ही सगळी बारा या अंकाचे महत्व दर्शवणारी उदाहरणे आहेत. पण बारा याच संख्येचा उपयोग निगेटिव्ह अर्थानेही केला जातो. एकाद्याचे वाटोळे होण्याला त्याचे बारा वाजले म्हणतात. व्यापार व्यवसायात एकाद्याला खूप मोठा तोटा झाला तर त्याने लाखाचे बारा हजार केले असे म्हणतात. एकाद्याची किंमत कमी झाली की तो बाराच्या भावात गेला. हा वाक्प्रचार कदाचित 'चीपर बाय डझन Cheaper by dozen' वरून आला असेल. 'केल्याने देशाटन .. मनुजा चातुर्य येतसे फार' असे सुभाषित आहे. पण या चातुर्याचा उपयोग कोणी इरसाल बनण्यात किंवा लबाडीमध्ये करत असेल तर तो (किंवा ती) बारा गावचे पाणी पिऊन आला (आली) आहे असे बोलले जाते.
या ना त्या कारणाने आणि अर्थाने बाराचा आकडा नेहमी आपल्या आसपास कुठे तरी फिरत असतो.

Monday, December 10, 2012

आता वाजणार की हो बारा बारा बारा ............

वीसावे शतक संपून सन २००० सुरू होण्याच्या क्षणाला वायटूके (Y2K) असे नाव काँप्यूटरवाल्यांनी दिले होते. वर्ष दाखवणा-या ९७, ९८, ९९ अशा आकड्यांना सरावलेल्या मठ्ठ काँप्यूटरांना २००० सालातला ०० हा आकडा समजणारच नाही आणि ते गोंधळून जाऊन बंद पडतील. त्यामुळे त्यांच्या आधारावर चालणा-या सगळ्या यंत्रणा कोलमडून पडतील. हॉस्पिटलमधल्या कुठल्या रोग्याला कोणते औषध द्यायचे किंवा कुणावर कसली शस्त्रक्रिया करायची हे कुणाला समजणार नाही. स्वयंचलित यंत्रांना कच्चा मालच मिळणार नाही किंवा चुकीचा माल त्यात घुसवला जाईल. नोकरदारांना पगार मिळणार नाही, त्यांचे बंकांमधले खाते बंद पडेल आणि एटीएम यंत्रांमधून पैसे बाहेर येणार नाहीत. जमीनीवरली विमाने उडलीच तरी भलत्या दिशांना जातील आणि आकाशात भ्रमण करणारी विमाने दगडासारखी खाली कोसळतील. अशा अनेक वावड्या उडवल्या जात होत्या. सर्वात भयानक बातमी अशी होती की वेगवेगळ्या महासत्तांच्या भूमीगत गुप्त  कोठारांमधले अनेक अण्वस्त्रधारी अग्निबाण बाहेर निघून ते भरकटत जातील आणि इतस्ततः कोसळून पृथ्वीवर हलकल्लोळ माजवतील.

असा अनर्थ घडू नये म्हणून सगळे संगणकविश्व कंबर कसून कामाला लागले होते. नव्या भारतातले संगणकतज्ज्ञ प्राचीन काळात भारताने शोधून जगाला दिलेल्या शून्याचा अर्थ जगभरातील संगणकांना नव्याने समजावून देण्याच्या कामाला लागले. त्या काळात ते रात्रंदिवस काम करून निरनिराळ्या सॉफ्टवेअर्सना वायटूकेफ्रेंडली किंवा कंप्लायंट बनवत राहिले. कदाचित त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेही असेल, पण वायटूकेचा बार फारच फुसका निघाला. त्यातून साधे फुस्ससुध्दा झाले नाही. पण त्याबरोबर आयटीवाल्या कंपन्यांच्या हातातल्या सोन्याची अंडी देणा-या कोंबड्या मात्र नाहीशा झाल्या आणि त्यांच्याकडल्या सगळ्या कोंबड्यांचे भाव धडाधडा कोसळू लागल्यामुळे त्यांच्या धंद्यावर मंदीचे सावट पसरले ते बराच काळ राहिले. 

त्यानंतर १ जानेवारी २००१ साली १ वाजून १ मिनिटांनी ०१:०१:०१:०१:०१:०१ हा क्षण येऊन गेला, त्याला फारसे महत्व मिळाले नाही. त्यानंतर दर वर्षी ०२:०२..., ०३:०३... वगैरे विशेष वेळा येत राहिल्या. त्या सगळ्या रात्री झोपेच्या काळात असल्याने कुणाला जाणवल्याही नाहीत. २००७ साली जुलै महिन्याच्या ७ तारखेला युरोपातल्या स्पेन या देशात एक आंतरराष्ट्रीय संमेलन भरवून त्यात ०७:०७:०७:०७:०७:०७ या वेळी म्हणजे सकाळी ७ वाजून ७ मिनिटे आणि ७ सेकंद या क्षणाचा मुहूर्त साधून पुरातनकाळातच माणसाने बांधून ठेवलेल्या जगातील सात जुन्या आश्चर्यांची नवी जगन्मान्य यादी जाहीर करण्यात आली.

त्यानंतर ०८:०८... ०९:०९... वगैरे क्षण येऊन गेले. मागील वर्षी येऊन गेलेल्या ११ नोव्हेंबर २०११ या दिवशी ११ वाजून ११ मिनिटे ११ सेकंद या वेळेत ११ हा आकडा ६ वेळा किंवा १ हा आकडा १२ वेळा येऊन गेला होता. तो याहीपेक्षा जास्त येण्याची वेळ यापूर्वी सन ११११ मध्ये येऊन गेली होती, पण त्या काळात सेकंदांपर्यंत अचूक वेळ दाखवणारी घड्याळेच अस्तित्वात नसल्यामुळे तब्बल अकरा हजार वर्षांमध्ये एकदा येऊन गेलेल्या या क्षणाचे महत्व कोणाच्या ध्यानातही आले नसेल. आता आणखी दोन दिवसांनी १२-१२-१२ हा दिवस उजाडणार असून त्या दिवशी दुपारचे १२:१२:१२ वाजणार आहेत. अशा प्रकारच्या गणिती योगायोगाची ही या शतकातली शेवटची संधी आहे. इंग्रजी कॅलेंडर्समध्ये कधीच तेरावा महिना येत नसल्यामुळे गेली बारा वर्षे दर वर्षी येणारा अशा प्रकारचा योग आता यानंतर एकदम सन २१०१ मध्ये येईल.

गेली अकरा वर्षे हे विशिष्ट वेळांचे क्षण त्यांच्या त्यांच्या ठरलेल्या वेळी येऊन गेले. त्यातल्या कोठल्याही क्षणी नेमके काय घडले? खरे तर कांही म्हणजे कांहीसुद्धा झाले नाही. बाहेर अंधार, उजेड, ऊन, पाऊस वगैरे सगळे काही ऋतुमानाप्रमाणे होत राहिले. कुठे पावसाची भुरभुर आधीपासून सुरू असली तर त्या क्षणानंतरही ती तशीच होत राहिली. तो क्षण पहायला सूर्य कांही त्या वेळी ढगाआडून बाहेर आला नाही. वारा मंद मंद किंवा वेगाने वहात होता आणि पानांना सळसळ करायला लावत होता. सगळे कांही अगदी नेहमीसारखेच चाललेले होते. आणि त्यांत कांही बदल होण्याचे कांही कारण तरी कुठे होते?

निसर्गाचे चक्र अनादी कालापासून फिरत आले आहे. त्या कालचक्राची सुरुवात कशी आणि कधी झाली हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. माणसानेच कुठून तरी वेळ मोजायला सुरुवात केली आणि आपण त्यातल्या विशिष्ट आकड्यांपर्यंत पोचत राहिलो. तारीख, महिना, वर्ष, तास, मिनिटे, सेकंद हे सगळे माणसाच्या मेंदूतून निघाले आहे आणि त्याच्या सोयीसाठी तो ते पहात राहिला आहे. निसर्गाला त्याचे कणभर कौतुक नाही. गेल्या अकरा वर्षांत अगदी योगायोगानेसुध्दा त्यातल्या अशा प्रकारच्या विशिष्ट तारखांना विशिष्ट क्षणी कोठलीच महत्वाची घटना जगात कुठेच घडली नाही. न्युमरॉलॉजी वगैरेंना शास्त्र समजणा-यांनी याची नोंद घ्यावी.

आता या वर्षी या शतकातले १२:१२:१२:१२:१२:१२ असे सहावार बारा वाजणार आहेत. तेंव्हासुध्दा त्यामुळे काही विशेष घडण्याची कणभर शक्यता मला दिसत नाही. पहायला गेल्यास बारा वाजणे या वाक्प्रचाराला मराठी भाषेत (आणि कदाचित हिंदीतसुध्दा) वेगळा खास अर्थ आहे. दोन हजार बारा या वर्षात त्या अर्थाने अनेकजणांचे बारा वाजून गेले. भारतीय क्रिकेट टीम त्या बाबतीत आघाडीवर दिसते. इंडियन ऑलिंपिक समिती, बॉक्सिंग फेडरेशन वगैरेंचेही असेच हाल झाले आहेत. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर आली म्हणून संबंधित लोकांचे बारा वाजले म्हणावे तर त्यासाठी सुरू झालेल्या लढ्यातच फाटाफूट पडून त्याचेही बारा वाजल्यागत झाले आहे. हे वर्ष संपेपर्यंत उरलेल्या तीन आठवड्यात आणखी कोणाकोणाचे काय काय होणार हे पहायचे आहे. दक्षिण अमेरिकेतल्या कुठल्याशा जमातीच्या ऋषीमुनींनी प्राचीन काळात लिहून ठेवलेल्या भविष्याप्रमाणे सगळ्या जगाचेच आता बारा वाजणार आहेत असा धाक काही लोक दाखवत आहेत. २००० साली वायटूकेमुळे होऊ पहाणारा अनर्थ किंवा त्याचा केला गेलेला बाऊ मानवनिर्मित होता आणि माणसांच्याच सावधगिरीमुळे किंवा हुषारीने तो तर टळला, आता हे दैवी सिध्दी प्राप्त झालेल्या लोकांनी वर्तवलेले इंकांचे तथाकथित भविष्यही काही दिवसांनी टाईमबार्ड होईल.

ते काही का असो, परवा येणा-या बारा तारखेला दुपारी बारा वाजून बारा मिनिटे आणि बारा सेकंद हा फक्त त्यातल्या संख्येच्या दृष्टीने विलक्षण असा क्षण तुम्ही आपल्या घड्याळात पाहून टिपू शकता आणि मनातल्या मनात त्यातला काल्पनिक थरार अनुभवू शकता. या क्षणी जन्माला आलेला एकादा महाभाग त्यामुळे अचाट सामर्थ्यवान झाला आणि तो सगळ्या जगाचे बारा वाजवणार आहे असे भविष्य कदाचित उद्या कोणी सांगेल आणि भोळसट लोक त्यावर विश्वासही ठेवतील. पण त्याचा पराक्रम किंवा ते भविष्य खोटे ठरलेले पहायला खूप वर्षे वाट पहावी लागेल.

Sunday, December 09, 2012

पं.जितेंद्र अभिषेकी यांची नाट्यगीते



माझे बीएआरसीतले एक सहकारी श्री.रमेश रावेतकर यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची आवड होती किंवा षौक होता असे म्हणण्यापेक्षा त्याचा ध्यास होता असे म्हणता येईल. प्रयोगशाळेतले काम आणि घर संसार सांभाळून ते चेंबूर येथील स्व.पं.दिनकर जाधव यांचेकडे जाऊन जयपूर घराण्याचे शास्त्रीय गायन शिकत तसेच घरी नियमितपणे रियाज करत. त्या काळातले जाधवबुवांचे शिष्य दर दीड दोन महिन्यात एकदा एकाद्या सुटीच्या दिवशी आळीपाळीने एकमेकांच्या घरी जमून गाण्याची मैफल जमवीत होते. अशा काही बैठका आमच्या घरीसुध्दा झाल्या. रावेतकर हे त्यातले एक स्टार परफॉर्मर असायचे. रिटायर झाल्यानंतर ते पुण्याला स्थाईक झाले आणि आमचा थेट संपर्क राहिला नाही, पण काही समाईक मित्रांकडून त्यांच्या प्रगतीची माहिती मिळत राहिली. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पूर्ण वेळ शास्त्रीय संगीताच्या साधनेला वाहून घेतले होते आणि त्या क्षेत्रात चांगला जम बसवला होता. त्या क्षेत्रातल्या जाणकार लोकांनी त्यांना पंडित ही उपाधी दिली होती.

मागच्या महिन्यात मी पुण्याला गेलेलो असतांना वर्तमानपत्रात एक छोटीशी जाहिरात पाहिली. पं.जितेंद्र अभिषेकी यांची अजरामर झालेली नाट्यगीते, कित्येत वर्षांच्या कालावधी न भेटलेल्या  रावेतकरांची भेट आणि त्यांचे प्रभावशाली गायन ऐकणे असा त्रिवेणी संगम साधायचे ठरवले आणि उद्यान सभागृह कुठे आहे याची चौकशी करून ते गाठले. आम्ही तिथे पोचेपर्यंत कार्यक्रम सुरू होण्याच्या बेतात होता. "आज पं.जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांचे शिष्य पं.रावेतकर त्यांची नाट्यगीते सादर करणार आहेत." या निवेदिकेने केलेल्या प्रस्तावनेमधला 'शिष्य' हा शब्द ऐकताच मी थोडासा दचकलो. रावेतकरांच्याबद्दलची इतकी महत्वाची बातमी यापूर्वी माझ्या कानावर आली नव्हती. पुढे कलाकारांची सविस्तर ओळख करून देतांना तिने सांगितले की त्यांनी एकलव्याप्रमाणे पं.अभिषेकी यांच्या गाण्याचे शिक्षण घेतले. बुध्दीमत्ता आणि कष्टाळू वृत्ती हे संशोधनासाठी आवश्यक असलेले गुण त्यांच्याकडे होतेच, शास्त्रीय संगीताचे ज्ञानही त्यांनी संपादन केले होते. पं.अभिषेकी यांच्या नाट्यगीतांचे व्यवस्थित विश्लेषण करून त्यातली विशिष्ट सौंदर्यस्थळे, बुवांच्या गायनातली खासियत वगैरे मधले सूक्ष्म बारकावे त्यांनी समजून घेऊन ते प्रयत्नपूर्वक आत्मसात केले होते हे त्यांच्या गाण्यातून जाणवत राहिले. वयोमानानुसार त्यांच्या गायनाला पडलेल्या मर्यादा सांभाळून त्यांनी ते गायन उत्कृष्ट रीत्या सादर केले. मी पुणेकर नसल्यामुळे "तुम्ही या गुरूंना कोणती गुरुदक्षिणा दिलीत?" असे विचारले नाही. पण आता ते पुणेकर झालेले असल्यामुळे "आम्ही चालवतो आहोत पुढे वारसा." असे चपखल उत्तर त्यांनी लगेच दिले असते. 

रावेतकरांनी आपल्या गायनाची सुरुवात एका रागमालेने केली. "हिंडोल रागमधुर" पासून सुरू होणा-या या रागमालेत पुढे भूप, छायानट, अलहैया बिलावल, शंकरा, हंसध्वनी, देस, तिलककामोद, बसंत, श्री, मारवा, सोहनी, भैरव, गुणकली, मालकंस, भैरवी, जौनपुरी, मधमास सारंग, बिभास वगैरे राग एकेका ओळीत एकापाठोपाठ एक करून येतात. त्या त्या रागाची ठळक ओळख एका ओळीत त्याच्या नावाबरोबर केली जाते. अशा प्रकारे भराभर राग बदलत त्या रागांचे वेगळे सूर अचूकपणे पकडणे अतीशय कठीण असते आणि भरपूर सराव केल्यानेच ते जमू शकते. स्व.पं.जितेंद्र अभिषेकी ही रागमाला त्यांच्या कार्यक्रमात गात असले तरी ती मुळात दुस-या एका पंडिताने रचली असल्याचे रावेतकरांनी सांगितले. स्व.शिवानंद पाटीलसुध्दा त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ही रागमाला अनेक वेळा छान गात असत आणि प्रत्येक वेळी त्यांना त्यावर टाळ्या मिळत. ही रागमाला एकाद्या मराठी नाटकात असेल असे मला वाटत नाही.

शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाची सुरुवात बहुतेक विद्यार्थी भूप रागाने करतात आणि त्यात थोडे प्राविण्य मिळवल्यानंतर सुरुवातीच्या काळातच यमन हा त्याचा मोठा भाऊ शिकतात असे म्हणतात. रावेतकरांनी यमन रागातलेच पहिले नाट्यगीत घेतले, "देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम". १९६४ साली रंगमंचावर आलेल्या मत्स्यगंधा या नाटकानेच अभिषेकी यांची कारकीर्द सुरू झाली होती. रामदास कामत यांनी गायिलेले त्या नाटकातले हे पहिलेच गाणे. वृंदावनी सारंग रागातले "साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वतांची" आणि खमाज रागातले "गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाठी" ही मत्स्यगंधा नाटकातली रामदास कामतांची आणखी काही गाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात रावेतकरानी गायिली. मुलतानी रागातले "नको विसरू संकेत मीलनाचा" हे त्यातले एकच गाणे गायचे राहिले. बीएआरसीत काम करत असतांना रावेतकरांनी एका हौशी नाटकसंस्थेने बसवलेल्या मत्स्यगंधा या नाटकात पराशर ऋषींची भूमिका वठवली होती. तेंव्हापासून त्यांनी ही नाट्यगीते तयार करून ठेवली होती.

नटवर्य बालगंधर्व आणि मास्टर दीनानाथ यांनी गाजवलेला मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ माझ्या जन्माच्याही आधीच होऊन गेला होता. मी जेवढी संगीत नाटके पाहिली आहेत त्यात पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे कट्यार काळजात घुसली हे नाटक निर्विवादपणे सर्वोत्कृष्ट होते असे मला वाटते. हे नाटकच संगीत या विषयावर आधारलेले आहे. भिन्न शैलींमध्ये शास्त्रीय संगीत गाणारे दोन गायक आणि त्यांना एकत्र आणू पाहणारी एक गायिका ही यातली मुख्य पात्रे आहेत. या तीघांनी निरनिराळ्या शैलींमध्ये गायन सादर करावे अशा रीतीची स्वररचना पं.जितेंद्र अभिषेकी यांनी यातील गीतांसाठी केली होती. उदाहरणार्थ त्यातले "घेई छंद मकरंद" हे एकच पद दोन गायक दोन निरनिराळ्या पध्दतीने गाऊन त्यामधला फरक स्पष्ट करून दाखवतात. स्व.वसंतराव देशपांडे या चतुरस्र गायकाने त्यातली आक्रमक प्रकारे गाणा-या ज्येष्ठ गायकाची मुख्य भूमिका लाजवाब वठवली होती. मुद्दाम पं.जितेंद्र अभिषेकी आणि पं.वसंतराव देशपांडे यांच्यासाठीच हे खास नाटक लिहिले असावे असे वाटते. नाट्यसंगीताच्या कुठल्याही कार्यक्रमात कटार काळजात घुसली मधले कमीत कमी एक गाणे तरी यायलाच हवे. दिन गेले भजनाविण सारे, या भवनातिल गीत पुराणे, मुरलीधर श्याम, सुरत पियाकी न छिन बिसुराये, लागी कलेजवाँ कटार यासारखी एकाहून एक सरस अशी मराठी किंवा हिंदी गीते या नाटकात आहेत. रावेतकरांनी त्यातले "तेजोनिधी लोहगोल भास्कर हे गगनराज" हे उगवत्या सूर्याची प्रार्थना असलेले अप्रतिम गाणे सादर केले.

पं. वसंतराव देशपांडे यांनीच अजरामर करून ठेवलेले भीमपलासी रागातले "काटा रुते कुणाला" हे गाणे एक नाट्यगीत आहे हे ही कदाचित सर्वांना ठाऊक नसेल. हे बंध रेशमाचे या रणजीत देसाई यांनी लिहिलेल्या नाटकातले हे गीत मात्र कवयित्री शांता शेळके यांचे आहे. या गीताची कल्पना एका उर्दू गजलेवरून घेतली आहे असे मी एकदा वाचले होते. शांताबाईंनीच लिहिलेले "तुझा गे नितनूतन सहवास" हे यमन रागातले नाट्यगीत वासवदत्ता या नाटकात होते. हे नाटक आणि हे गीत फारसे गाजले नाही. त्या मानाने वसंत कानेटकरांच्या मीरा मधुरा या नाटकातले "स्वप्‍नात पाहिले जे ते राहू देत स्वप्‍नी" हे रामदास कामत यांनी गायिलेले गौडमल्हार रागातले पद जास्त लोकप्रिय झाले होते. पण ते भावगीतासारखे वाटते. धाडिला राम तिने का वनी या द.ग.गोडसे यांच्या नाटकातले पण राजा बढे यांनी लिहिलेले "कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला" हे पद पुरुष पात्राचे आहे, पण मी ते आशा खाडीलकर यांच्या कार्यक्रमात ऐकल्याचे मला आठवते. हे नाटक पहायला न मिळाल्यामुळे ते गाणे नक्की कोणाच्या तोंडी आहे ते मला माहीत नाही. हे गीत सूर्यवंश नावाच्या (मी न ऐकलेल्या रागात) असल्याचे रावेतकरांनी सांगितले. पं.जितेंद्र अभिषेकी यांनी स्वररचना केलेल्या या वेगवेगळ्या प्रकारच्या नाट्यगीतांची निवड रावेतकरांनी आपल्या कार्यक्रमात केली होती.

गोरा कुंभार या जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या नाटकातली अशोकजी परांजपे यांनी लिहिलेली गीते त्यातले शब्द आणि त्यावर चढवलेला स्वरसाज या दोन्ही दृष्टीने अप्रतिम आहेत. इतिहासकाळात होऊन गेलेल्या गोरा कुंभारासाठी अशोकजींनी लिहिलेली "पाहू द्या रे मज विठोबाचे मुख, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, केशवाचे भेटी लागलेसे पिसे वगैरे गीते जुन्या संतकवींच्या अभंगांसारखी वाटतात. त्या नाटकातले जौनपुरी रागातले "अवघे गर्जे पंढरपूर" हे नाट्यगीत रावेतकरांनी या कार्यक्रमात घेतले होते.

मत्स्यगंधा या अभिषेकी यांच्या पहिल्या नाटकानंतर दोन वर्षांतच आलेले ययाती आणि देवयानी हे पौराणिक नाटकसुध्दा खूप गाजले होते. कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच प्रख्यात साहित्यिक स्व.वि.वा.शिरवाडकर यांनी लिहिलेल्या या नाट्यकृतीमधली "तम निशेचा सरला अरुण कमल प्राचीवर फुलले, प्रेम वरदान स्मर सदा, मी मानापमाना नच मानतो, यतिमन मम मानित त्या एकल्या नृपाला, सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा, हे सुरांनो चंद्र व्हा" आदि सगळी गाणी तुफान गाजली होती, अजूनही ती अनेक वेळा आपल्या कानावर पडतात. कुसुमाग्रजांची अलौकिक साहित्यिक प्रतिभा आणि अभिषेकीबुवांची अप्रतिम स्वररचना या दोन्हींचा संयोग झाल्यामुळे त्या गाण्यांमध्ये सोनेपर सुहागा असे झाले आहे. त्यातले "सर्वात्मका सर्वेश्वरा" हे गीत भैरवी रागात आहे असे मी समजत होतो, पण त्याच नाटकात पुन्हा "तम निशेचा फुलला" ही दुसरी भैरवी कशासाठी घातली आहे असे मला वाटत असे. सर्वात्मका हे नाट्यगीत सादर करतांना रावेतकरांनी असे सांगितले की जौनपुरी आणि बिलासखानी तोडीमधल्या सुरात हे गाणे गुंफून त्यांच्या विशिष्ट पध्दतीने केलेल्या मांडणीतून भैरवीचा भास त्यात उत्पन्न केला आहे. मी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले नसल्यामुळे त्यावर काही बोलायचा मला अधिकार नाही. या कार्यक्रमाची सांगता रावेतकरांनी "दुर्दैवे आपण दुरावलो या देही" ही ओळ भैरवी रागात आळवून केली. मत्स्यगंधा नाटकातल्या "गुंतता हृदय हे" या गीतातली ही ओळ नाटकाच्या अखेरीस गाऊन प्रेक्षकांचा निरोप घेतला जातो अशी माहिती त्यांनी सांगितली.

अभिषेकी यांनी स्वरबध्द केलेल्या पुरुषनटांच्या गीतांमधली निवडक गाणी रावेतकरांनी या प्रोग्रॅममध्ये गायिली होती. याखेरीज स्त्रीपात्रांच्या तोंडी असलेली खूप प्रसिध्द गाणी आहेत. मत्यगंधा नाटकातली "गर्द सभोती रान साजणी, तव भास अंतरा झाला आणि अर्थशून्य भासे मज हा" ही आशालता वाबगावकर यांची गाणी, धाडिला राम तिने का वनी नाटकातले आशा खाडिलकर यांचे "घाई नको बाई अशी आले रे बकुळ फुला" हे गीत, हे बंध रेशमाचे या नाटकातली "का धरिला परदेश आणि विकल मन आज झुरत असहाय" ही बकुळ पंडित यांची नाट्यगीते अशी अनेक उदाहरणे देता येतील. पं.अभिषेकी यांच्या स्वररचनेचे एक वैशिष्ट्य रावेतकरांनी असे सांगितले की त्यांची गाणी पूर्वीच्या काळातल्या गाण्यांसारखी खूप काळ आळवून आळवून गायची नव्हती. तानांची भेंडोळीच्या भेंडोळी त्यात टाकायची नसत. पण प्रत्येक ओळींमध्येच लहान लहान तानांचे सुंदर तुकडे असलेल्या गोड जागा असतात. सिनेमातल्या गाण्यांप्रमाणे त्यांची गाणी जशीच्या तशीच गायली तर चांगली वाटतात. एकाद्याला शास्त्रीय संगीतातली रागदारी चांगली येते म्हणून त्याने त्यात आणखी भर टाकून लांबण लावली तर त्यातले सौंदर्य शिल्लक रहात नाही. पण गायकाचा कस लागेल इतक्या जागा त्यांनीच गाण्याच्या चाली बांधतांना त्यात पेरून ठेवल्या आहेत.

यामुळेच पं.अभिषेकींच्या नंतर त्यांच्या जवळपास सुध्दा पोचू शकेल असा दुसरा संगीतकार मराठी नाट्यविश्वाला मिळाला नाही.

Wednesday, December 05, 2012

तेथे कर माझे जुळती - १२ - पं.जितेंद्र अभिषेकी

मी नोकरीसाठी मुंबईला आलो तेंव्हा मराठी संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन सुरू झाले होते. स्व.विद्याधर गोखले यांनी काही नवी संगीत नाटके लिहून ती रंगमंचावर आणली होती. त्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. पण त्या काळात आलेल्या मत्स्यगंधा या संगीत नाटकाने लोकप्रियतेचे शिखर गाठले. या नाटकाबरोबरच जितेंद्र अभिषेकी हे एक नवे नाव ज्याच्या त्याच्या तोंडी झाले.

स्वयंवर आणि सौभद्र या आद्य नाटकांपासूनच संगीत नाटक हे पौराणिक काळामधल्या कथेवर असावे असा संकेत निर्माण झाला होता. याला काही सन्माननीय अपवाद होते. मध्ये खूप वर्षे निघून गेल्यानंतरसुध्दा स्व.विद्याधर गोखले यांनीही आपली नाटके पौराणिक किंवा निदान ऐतिहासिक काळातील वातावरणाच्या पार्श्वभूमीवर लिहिली होती. मत्स्यगंधा हे नाटकसुध्दा महाभारतातील कथेवर आधारलेले होते. अशा पौराणिक काळातले जटाधारी ऋषिमुनी नेहमी महाज्ञानी, पंडित आणि धीरगंभीर प्रकृतीचे दाखवले जातात. त्याहून वेगळ्या प्रवृत्तीच्या कळलाव्या नारदमुनींच्या तोंडी दिलेले 'लग्नाला जातो मी द्वारकापुरा' या गीताचा अपवाद सोडल्यास इतर कोणा ऋषीने ताना पलटे घेऊन गाणे रंगवले असल्याचे मला तरी माहीत नव्हते. पण मत्स्यगंधा या नाटकातले पराशर मुनी नाटकाच्या पहिल्या अंकातच "देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम" असे गात गात प्रवेश करतात, "नको विसरू संकेत मीलनाचा, तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा" असे गात प्रेमयाचना करतात, "गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी, हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी" या गाण्यातून प्रेमाची पूर्तता करतात आणि त्यानंतर "साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची " असे गात अंतर्धान पावतात ते कायमचेच. सत्यवतीच्या जीवनातले नाट्य त्यानंतर सुरू होते आणि अखेरपर्यंत चालत राहते. पराशर मुनीचा त्यात पुन्हा कधी साधा उल्लेखदेखील होत नाही.

नाटकाच्या कथानकात पराशर हे पात्रच नसते तरी कदाचित चालले असते, पण हे नाटक इतके चालले ते मात्र प्रामुख्याने पराशरांच्या चार नाट्यगीतांमुळे आणि विशेषतः त्या गाण्यांना पं.जितेंद्र अभिषेकी या नवोदित संगीतकाराने दिलेल्या अप्रतिम चालींमुळे. रामदास कामत या गायक नटाने त्यात जीव ओतून त्यांना अजरामर केले हे सुध्दा खरे आहेच. पण त्यांचे शास्त्रीय गायनातले सामर्थ्य ओळखून आणि त्यांच्या दमदार आवाजात चांगली खुलेल अशी स्वररचना अभिषेकींनी या गाण्यांसाठी केली. सत्यवती ही या नाटकातली मध्यवर्ती भूमिका आशालता वाबगावकर या गुणी आणि कुशल अभिनेत्री वठवत असत. त्यांच्या गोड आवाजाचा पुरेपूर उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने त्यांना दिलेल्या गाण्यांना वेगळ्या प्रकारच्या मधुर चाली दिल्या होत्या. नाटकातले प्रसंग, गीतामधले भाव, नटनट्यांचे आवाज, त्यांची शास्त्रीय संगीतातली तयारी या सर्वांचा अभ्यास आणि विचार करून शिवाय ती गाणी लोकांना आवडावीत, त्यांना सहजपणे गुणगुणता यावीत अशा दृष्टीने त्यांना चाली लावण्याची अद्भुत किमया पं.अभिषेकी यांनी साध्य करून दाखवली होती. त्यानंतरही त्यांनी अनेक अजरामर ठरलेल्या नाट्यगीतांची संगीतरचना केली आणि मत्स्यगंधा हा एक योगायोग नव्हता हे दाखवून दिले.

देवल आणि किर्लोस्करांच्या काळात नाटक कंपनीतल्या सगळ्या लोकांचा मुक्काम एकत्र असायचा. नाटक मंडळींकडे एक गायनाचा मास्तर असायचा. संगीत नाटकातल्या पदांना चाली लावणे, नटांना ती पदे शिकवून त्यांच्या तालमी घेणे वगैरे कामे तो नित्यनियमाने करायचाच, शिवाय प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळीसुध्दा हजर राहून एकादे वाद्य वाजवत असे. त्या वेळी नाटकांना वेळेची मर्यादा नसल्यामुळे गायक नट ती पदे आळवून आळवून गात असत. शास्त्रीय संगीताचा गायक जसा एकेक राग असंख्य प्रकारच्या ताना घेऊन फुलवतो, त्याप्रमाणे हे गायक नटसुध्दा त्यांच्या कुवतीनुसार त्या पदांचा विस्तार एकाद्या बंदिशीप्रमाणे करीत असत. अभिषेकी ज्या काळात आले तेंव्हा अशा प्रकारच्या नाटककंपन्या राहिल्या नव्हत्या. नट, नट्या, वादक वगैरे मंडळी एकत्र रहात नसत. काळानुसार झालेल्या बदलामुळे आधी ठराविक वेळात तालीम करायची आणि एकदा नाटक बसले की त्याच्या प्रयोगांच्या वेळी भेटत रहायचे असा रिवाज पडला होता. नाटकाचा प्रयोग ठराविक वेळेत संपलाच पाहिजे हे आवश्यक झाले होते. या सर्व गोष्टींचे भान ठेऊन त्यानुसार संगीतरचना करणे हे काम अधिक कौशल्यपूर्ण झाले होते. ते केवळ दिग्दर्शन न राहता संगीताचे नियोजन झाले होते.

मी मुंबईला आलो तेंव्हा माझ्या मित्रांबरोबर दादरला शिवाजीमंदिराच्या जवळच रहात होतो. तिथे लावलेले आगामी नाटकांचे बोर्ड येता जाता पहायचे आणि आधीच तिकीटे काढून त्यातली बरी वाटणारी नाटके पहायची सवयच आम्हाला लागली होती. नाटकाच्या बोर्डावरले जितेंद्र अभिषेकी हे नाव वाचून ते नाटक आम्ही नक्की पहात होतो आणि आमची कधीच निराशा झाली नाही. त्या नाटकांमधली नाट्यगीते उत्तम असायचीच, ते नाटकसुध्दा दर्जेदार असायचे. संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी अभिषेकी त्या नाटकाची निवड चोखंदळपणे करत असावेत.

त्या काळातल्या बहुतेक सार्वजनिक गणेशोत्सवात शास्त्रीय संगीताचा एकादा तरी कार्यक्रम हमखास असायचा. दादरमध्ये सुध्दा काही ठिकाणी रस्त्यावरच गोणपाट अंथरून प्रेक्षकांना बसायची व्यवस्था केली जायची. आजकाल त्या भागात काय परिस्थिती आहे हे मी पाहिलेले नाही, पण त्या काळातली मोटारगाड्यांची आणि माणसांची संख्या खूप कमी असल्यामुळे हे शक्य असायचे. काही ठिकाणी त्या भागातल्या एकाद्या शाळेच्या सभागृहात कार्यक्रमाची सोय केली जात असे. रस्त्यावरला कार्यक्रम विनामूल्यच असायचा, सभागृहातल्या प्रोग्रॅमला नाममात्र तिकीट असायचे. आम्हाला ते सहज परवडत होते. मला आजसुध्दा शास्त्रीय संगीतातले काही कळते अशातला भाग नाही, त्या काळात तर त्यातले ओ की ठो समजत नव्हते. पण आमच्या एका रूममेटने शाळेत असतांना संगीताच्या एक दोन परीक्षा दिल्या होत्या एवढ्या भांडवलावर तो उस्तादगिरी करायचा. त्याच्या आग्रहाखातर त्याच्यासोबत आम्हीही अशा बैठकींना जाऊन बसत होतो. संगीताच्या क्षेत्रामधल्या बड्या बड्या प्रस्थांचे गायन अशा उत्सवांमध्ये जवळ बसून ऐकायला मिळाले. त्या काळात जितेंद्र अभिषेकी कदाचित एवढे जास्त प्रसिध्द झाले नसतील. दादर भागातल्या कुठल्या ना कुठल्या गणेशोत्सवात त्यांचे गायन हमखास असायचेच आणि आम्ही ते कधी चुकवले नाही.

आम्ही ऐकलेल्या अभिषेकींच्या गायनाच्या पहिल्याच कार्यक्रमाच्या वेळी योगायोगाने आम्हाला अगदी स्टेजच्या पुढ्यातच बसायला जागा मिळाली होती. अभिषेकींचा आवाज नैसर्गिक रीत्या पं.भीमसेन जोशी यांच्यासारखा बुलंद नव्हता किंवा स्व.सुधीर फडके यांच्यासारखा मुलायमही नव्हता. त्यांनी रियाजातून तो कमावला होता. गायनाच्या सुरुवातीला त्यांनी खर्जामध्ये व्हँ अशी सुरुवात केल्यावर आम्हाला हसू फुटले आणि विलंबित ऐकता ऐकता झोप यायला लागली. समोर बसलेलो असल्यामुळे एकमेकात बोलूही शकत नव्हतो. आमच्या आजूबाजूला बसलेल्या इतर नवख्या पोरांचीही अशीच अवस्था होती. असल्या मठ्ठ दगडांसमोर आपली अलौकिक कला सादर करतांना पंडितजींना किती यातना होत असतील याची कल्पना करता येणार नाही. पण  आमच्यासारख्या अज्ञानी लोकांकडे बिलकुल लक्ष न देता ते आपल्या गायनात तल्लीन होऊन गेले. त्यानंतर त्यांचे गायन पचनी पडत नसले तरी त्यांच्या मुखावरले भाव पहात राहिलो. दृत गतीत बंदिश सुरू झाल्यावर मात्र आपण काही तरी अपूर्व ऐकत असल्याचे जाणवले आणि नाट्यगीतांनी तर धमाल आणली. टाळ्यांच्या कडकडाटात सारा परिसर दुमदुमून गेला.

त्यानंतर मात्र माझ्या मनात त्यांच्या गायनाचे विलक्षण आकर्षण निर्माण झाले आणि दादरला असेपर्यंत मीही माझ्या मित्राबरोबर ते पहात आणि ऐकत राहिलो. अणुशक्तीनगरला रहायला गेल्यानंतर मराठी नाटके किंवा शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांची तिकीटे काढणे आणि दूरच्या नाट्यगृहात जाऊन ते पहाणे बरेच कठीण झाल्यामुळे ते कमी होत गेले. पण मध्ये अशी काही वर्षे निघून गेल्यानंतर आमची योगायोगाने स्व.शिवानंद पाटील आणि योजना यांच्याशी ओळख झाली आणि वाढत गेली. त्यांचे योजना प्रतिष्ठान अनेक सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत होते. त्या सर्व कार्यक्रमांना आमची उपस्थिती असायचीच, शिवाय इतर संस्थांतर्फे होणा-या शिवानंद पाटील यांच्या गायनालाही आम्ही शक्य तोवर जात होतो. शिवानंद पाटील हे पं.जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य होते आणि त्यांची नाट्यगीते, अभंग, भावगीते वगैरे त्यांच्या कार्यक्रमात जवळ जवळ तंतोतंत तशाच पध्दतीने गात असत. आम्ही ऐकलेल्या अभिषेकींच्या गाण्यांची यातून उजळणी होत राहिली. शिवाय टेलीव्हिजन आणि टेप रेकॉर्डरवर आम्ही ती ऐकत होतोच. एक दोन वेळा त्यांच्या कार्यक्रमालाही गेलो. काही काही वेळा योजना प्रतिष्ठानच्या कार्यक्रमालाही ते सन्माननीय आमंत्रित पाहुणे म्हणून उपस्थित असत. शिवानंद किंवा योजना यांच्यासोबत राहिल्यामुळे त्यांची भेट होऊन एकाद दुसरे वाक्य बोलणेही होत असे.

अशाच एका कार्यक्रमात मी त्यांना पाहिले तेंव्हा त्यांची प्रकृती काही ठीक दिसली नाही. त्यावेळी ते अजून पुण्याला रहायला गेले नव्हते की पुण्याहून त्या वेळी मुंबईला आले होते ते आता आठवत नाही. वजनाच्या प्रमाणात त्यांच्या अंगातली ताकत कमी झाली असल्यामुळे त्यांची हालचाल संथ झाली होती, त्यांना बोलतांना दम लागत होता. त्यानंतर ते पुन्हा धडधाकट झाले की नाही तेही समजले नाही. त्यांचे एक जवळचे आप्त श्री.गोडसे योजना प्रतिष्ठानच्या कामात भाग घेत होते आणि अधून मधून त्यांची भेट झाली तर त्यांचेकडून अभिषेकीबुवांची खुषाली कळत असे. पण नंतर आम्हाला त्या कार्यक्रमाला जाणेही शक्य होईनासे झाले. वर्तमानपत्रात त्यांच्याबद्दल जेवढे छापून येत होते किंवा टीव्हीवर दिसत होते तेवढाच संबंध राहिला. त्यांच्या निधनाची दुःखद बातमी ऐकल्यानर मात्र मन सुन्न होऊन गेले.

Tuesday, December 04, 2012

सहा डिसेंबर - एक अनुभव

सहा डिसेंबर ही तारीख आता येण्यातच आहे. या तारखेची खूप वर्षांपूर्वीची एक आठवण जागी झाली. त्या वेळी तीन किंवा चार डिसेंबरच्या रात्रीच्या ट्रेनने माझा मुलगा विदर्भातल्या एका गावी गेला होता. दुसरे दिवशी सकाळी तिथे पोचल्यानंतर तिथले काम दिवसभरात आटोपून संध्याकाळच्या गाडीने तो मुंबईला परतणार होता. परतीचे कन्फर्म्ड रिझर्वेशन केलेले होते. संध्याकाळी त्याने मला फोन केला आणि सगळी कामे सुरळीतपणे झाली असून ठरल्याप्रमाणे तो परतीच्या प्रवासासाठी स्टेशनला जायला निघाला असल्याचे त्याने सांगितले. 

तासाभराने पुन्हा त्याचा फोन आला. यावेळी त्याचा आवाज घाबराघुबरा वाटत होता. तो एवढेच म्हणाला, "मी सांगतो तो फोन नंबर लिहून घ्या आणि तुम्ही त्या नंबरावर मला लगेच फोन करा." एवढे सांगून त्याने फोन ठेऊन दिला. तो असे कां सांगतो आहे हे त्याने सांगितले नाही आणि ते विचारण्यासाठी सुध्दा त्याला फोन लावण्यात काही अर्थ नव्हता. याबद्दल विचार करण्यात वेळ न घालवता मी त्याने दिलेला नंबर फिरवला. दोन तीन प्रयत्नानंतर तो लागला. तो कोणत्या तरी दुकानातला किंवा हॉटेलातला फोन असावा, पण माझ्या मुलानेच उचलला आणि सांगितले, "बाबा, माझा मोबाईल पूर्णपणे डिस्चार्ज झाला आहे म्हणून मी हा नंबर दिला आहे. आज मी गाडी पकडू शकलो नाही, आता माझ्याकडे फारसे पैसे शिल्लक नाहीत आणि मला बरे वाटत नाही आहे. मी काय करू तेच समजत नाही."
"पण तुझ्याकडं परतीचं रिझर्वेशन होतं आणि तू तर गाडी पकडायला वेळेवर निघाला होतास ना?"
"हो, पण सहा डिसेंबरसाठी मुंबईला जाणा-या लोकांनी प्लॅटफॉर्म अगदी गच्च भरला होता, शिवाय गाडी येतांनाच शिगोशीग भरून आली होती. कुठल्याही डब्यात पाय ठेवायला जागा नव्हती. रिझर्वेशनच्या डब्यात देखील हीच परिस्थिती होती. माझ्या डब्याचा तर दरवाजासुध्दा कोणी उघडला नाही. टीसी वगैरेंचा पत्ताच नव्हता. जे लोक दाराला धरून लोंबकळत जाऊ शकत होते तेवढेच कदाचित पुढे गेले असतील. बाकीचे सगळे लोक खालीच राहिले. आता मी काय करू? मला काहीच समजत नाही."
मी विचार केला की पुढल्या गाडीमध्येही अशीच परिस्थिती असणार आणि शिवाय त्यात रिझर्वेशन नाही म्हणजे जास्तच त्रास होणार. किंबहुना त्या गाडीत गुसणेसुध्दा अशक्यच असणार. आणखी किती तासांनंतर किंवा दिवसांनंतर मुंबईच्या दिशेने जाणारी गर्दी कमी होईल ते सांगता येणार नाही. त्याला तोपर्यंत हॉटेलात राहणेही परवडण्यारखे नव्हते, त्याच्याकडे त्यासाठी पैसे नव्हतेच, एटीएम कार्ड वगैरे काही नव्हते आणि जातांना बरोबर नेलेल्या जास्तीच्या पैशाची आता गरज पडणार नाही अशा विचाराने त्याने त्यातले बरेचसे खर्च करून टाकले होते. त्यातून त्याची तबेतही बिघडली होती. त्याला मदत करण्यासाठी जरी मी लगेच जायला निघालो तरी मी तिकडे कुठल्या वाहनाने जाणार? आणि मला इतक्या दूर जाऊन पोचायलाही खूप वेळ लागणार. तोपर्यंत तो काय करेल? त्याच्या प्रश्नाला लगेच देण्यासारखे काही उत्तर माझ्याकडे नव्हतेच. त्यासाठी मी अर्धा तास वेळ मागितला आणि तोपर्यंत बसची काही सोय होते का याची चौकशी करायला सांगितले, पण ती नसणार हे मला माहीत होते. 
मी लगेच मुंबईतल्या दोघा तीघा नातेवाईकांना फोन लावून नागपूरात रहाणा-या त्यांच्या आप्तांची चौकशी केली. त्यातले कोणी त्या दिवशी तिथे होते, कोणी परगावी गेले होते, कोणाच्या घरी आता त्यांचा मुलगाच तेवढा रहात होता. त्या सगळ्यांचे फोन नंबर मी लिहून घेतले. त्यातल्या दोघांना मी साधारणपणे ओळखत होतो. त्यांना फोन लावून मी त्यांच्याशी बोलून घेतले आणि माझ्या मुलाने दिलेला फोन नंबर पुन्हा फिरवला.
माझा फोन येण्याची तो वाटच पहात होता. त्या वेळी तिथून मुंबईला किंवा पुण्याला जाण्यासाठी बसची काही व्यवस्था नव्हतीच, मुंबईपर्यंत येण्यासाठी खाजगी वाहन मिळणेही दुरापास्त होते. त्या नवख्या गावात तो कोणालाही ओळखतही नव्हता. मी आधी त्याच्या तब्येतीची चौकशी केली. ती थोडीशी बिघडली असली तरी तो हिंडूफिरू शकत होता. जास्त गंभीर अवस्था असली तर नागपूरहून कोणाला तरी तिथे जायला विनवावे लागले असते. त्या दिवशीच्या अती गर्दीमुळे तो माणूसही रेल्वेने जाऊ शकला नसताच. त्याला कार किंवा जीपची व्यवस्था करावी लागली असती. सुदैवाने त्याची आवश्यकता नव्हती हे ऐकून थोडा धीर आला. मी मुलाला समजावून सांगितले, "आता मुंबईकडे येण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही आणि तिथे थांबून राहूनही काही उपयोग नाही. त्यापेक्षा तू उलट दिशेला जाणारी एकादी ट्रेन पकड आणि सरळ नागपूरला जा. त्या गाडीत बहुधा जास्त गर्दी असणार नाही आणि तुला तिच्यात जागा मिळेल. तिथे आपल्या ओळखीतले अमूक अमूक लोक राहतात, त्यांचे पत्ते आणि फोन नंबर लिहून घे आणि त्यांच्याकडे जाऊन धडक. मी त्यांना तसे सांगून ठेवले आहे. जे काही करायचे ते प्रकृतीला सांभाळून कर."
ती रात्र आम्ही अस्वस्थ अवस्थेतच कशीबशी काढली. त्यानंतर आम्हीही त्याला फोन करू शकत नव्हतो आणि त्यालाही ते शक्य झाले नाही. दुसरे दिवशी सकाळी त्याचा फोन आला. एका नातेवाईकाचा मुलगा त्याला उतरवून घेण्यासाठी नागपूरच्या स्टेशनावर आला होता. पण त्यांचेकडे काही अडचण असल्यामुळे तो त्याला दुस-या नातेवाईकांकडे घेऊन गेला. त्यांनी आपुलकीने त्याची सगळी काळजी घेतली आणि त्याला मुंबईला जाणा-या विमानात बसवून दिले. संध्याकाळपर्यंत तो सुखरूपपणे घरी येऊन पोचला. 

प्रत्यक्ष अनुभवातून तो काही धडे शिकला होता. प्रवासात केव्हा कसली अडचण येईल आणि त्यामधून पैशाची गरज पडेल ते सांगता येत नाही, त्यासाठी काही तरतूद किंवा पर्यायी उपाय नेहमी आपल्या खिशात बाळगायला हवेत आणि परत घरी येऊन पोचेपर्यंत ते सांभाळून ठेवायला हवेत. आजकाल क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम वगैरेंच्या सोयी खूप वाढल्या असल्याने हे काम थोडे सोपे झाले आहे. कोणता माणूस आपल्याला कधी आणि किती उपयोगी पडेल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे आपल्या चांगल्या व्यवहाराने शक्य तितकी माणसे जोडून ठेवणे आपल्या फायद्याचे असते. 

तेंव्हापासून आम्ही कानाला खडा लावला, काहीही कारण असले तरी पाच सहा डिसेंबरला मुंबईकडे येणा-या ट्रेनमधून प्रवास करायचा विचार मनात आणायचा नाही.

Friday, November 30, 2012

तेथे कर माझे जुळती - ११ - श्री.सुधीर दामले


मी लहान असतांना मला काही म्हणजे काहीही, अगदी दिसेल ते सगळे काही वाचण्याचे विलक्षण वेड होते. जे पुस्तक माझ्या हातात पडेल त्यातले मला काहीही समजो वा न समजो, त्यावर घातलेल्या वर्तमानपत्राच्या कव्हरसकट त्यातले अक्षर न् अक्षर मी वाचून काढत असे. त्यात मुद्रक, प्रकाशक, संपादक वगैरेंची नावेसुध्दा वाचली जात. त्यातले 'नवीन किताबखाना' हे नाव मला जरा वेगळे वाटायचे. 'किताब' म्हणजे पुस्तक आणि 'खाना' म्हणजे जेवण एवढाच त्या शब्दांचा अर्थ शाळेत शिकलेल्या हिंदी भाषेच्या ज्ञानावरून कळला होता, उर्दूचा गंधही नव्हता. त्या वयात 'नवीन', 'पुस्तक' आणि 'जेवण' या तीन्ही गोष्टी मला अतीशय प्रिय असल्यामुळे त्या नावाचा एकत्र संदर्भ लागत नसला तरी ते नाव लक्षात राहिले होते. 'किताबखाना' या उर्दू शब्दातल्या 'खाना'चा खाण्याशी कसलाच संबंध नाही असे मला नंतर कळले, पण तोवर तो शब्द माझ्या स्मृतीमध्ये रुतून बसला होता.  

मी कॉलेजात शिकत असतांना 'मार्मिक' हे व्यंगचित्रांना वाहिलेले बहुधा पहिलेच आणि कदाचित अखेरचे प्रसिद्ध मराठी साप्ताहिक सुरू झाले आणि अल्पावधीत ते तुफान लोकप्रिय झाले. मराठी युवकांना तर पुढच्या आठवड्याचा अंक केंव्हा बाहेर पडतो आणि आपण तो वाचतो असे होत असे. विनोदी तसेच जळजळीत व्यंगचित्रे आणि खुसखुशीत तसेच खरमरीत लेखांनी भरलेल्या त्या साप्ताहिकाच्या शेवटच्या पृष्ठावर 'पिटातल्या शिट्ट्या' या सदराखाली तत्कालिन चित्रपट आणि नाटकांचे खुमासदार रसग्रहण केलेले असे. अंकामधील इतर मजकुराप्रमाणे या स्तंभातसुध्दा नर्मविनोद आणि परखड टीका यांचे बेमालूम मिश्रण असायचे. सिनेमा किंवा नाटक यांचा पार पंचनामा न करता किंवा त्यातला कथाविषय सांगून न टाकता त्याबद्दल कुतूहल कायम राखून हे मनोरंजक लेख लिहिलेले असत. माझी वैयक्तिक मते त्या स्तंभलेखकाच्या मताशी जुळत होती की त्याचे शेरे ताशेरे वाचून त्यानुसार माझी मते त्या वयात घडत होती ते मला आता नक्की सांगता येणार नाही, पण मला हे सदर खूप आवडत असे. मी आधीच पाहिलेल्या नाटक सिनेमाबद्दल झालेली माझी मते हे सदर वाचतांना अधोरेखित होत असत आणि हे सदर वाचल्यानंतर ते खेळ पाहतांना त्यातले बारकावे जास्त चांगले कळत असत. थोडक्यात सांगायचे झाल्यास एकादा कार्यक्रम बरा किंवा चांगला वाटला तर तो कशामुळे आणि तो टुकार वाटला तर कशामुळे हे मला थोडे समजायला लागले. 'शुध्दनिषाद' या टोपणनावाने हा स्तंभ लिहिणा-या समीक्षकाचे नाव सुधीर दामले असे होते असे समजले.

किताबखाना आणि सुधीर दामले यांच्यात परस्परांमध्ये काही संबंध असेल असा विचार माझ्या मनात येण्याचे कारण नव्हते आणि माझ्या व्यक्तीगत जीवनाशी त्या दोघांचा दूरान्वयानेही काही संबंध नव्हता. पण माझे लग्न झाल्यानंतर तो आला. पती आणि पत्नी यांचे सर्व नातलग लग्नानंतर एकमेकांचे इन-लॉज होतात, त्यामुळे माझ्या विवाहानंतर आमच्या नातेवाईकांची संख्याही एकदम दुप्पट झाली. माझ्या नव्याने झालेल्या नातेवाईकांमध्ये जयश्रीताई दामले यांचे नाव ठळक होते. पहिल्या भेटीतच चांगली छाप पाडण्यासारखे त्यांचे ठसठशीत व्यक्तीमत्व आहेच, शिवाय मनमिळाऊ स्वभावाने त्या इतरांना आपलेसे करतात. त्यांचे पती सुधीरराव दामले यांनाही सगळ्या आप्तेष्टांमध्ये मोठे मानाचे स्थान होते. हे जोडपे मुंबईमध्ये रहात होते हे आमच्या दृष्टीने खूपच महत्वाचे होते. नव्याने संसार थाटतांना अनेक अडचणी आणि शंका यांचे डोंगर समोर असतात. जुन्या पिढीमधल्या लोकांचे आणि आपले आचारविचार यात जनरेशन रॅप असते. यावेळी आपल्याच पिढीमधल्या आणि सुस्थितीमध्ये स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांचे मार्गदर्शन मोलाचे असते. त्यासाठी सुरुवातीच्या काळात आमचे पाय आपोआप त्यांच्या घराकडे वळत असत.

त्या काळात सर्वांकडे टेलीफोन नसायचे. मोबाईल फोनचा शोधच लागलेला नव्हता आणि मुंबईमध्ये घरी पोस्ट खात्याचा टेलीफोन मिळण्यासाठी दहा बारा वर्षे वाट पहावी लागायची. मी तर त्यासाठी अजून अर्जसुध्दा केला नव्हता. दामल्यांच्या घरी फोन असला तरी शेजारपाजारी कुणाकडे जाऊन त्यांना फोन करण्याची सोय आमच्याकडे नव्हती किंवा कोणाकडे भेटायला जाण्यापूर्वी त्यांना अगोदर सूचना देण्याची सवयही अजून लागली नव्हती. आपण आपले सरळ जाऊन धडकायचे, भेटले तर उत्तमच, नाही भेटले तर चौपाटीवर फिरून यायचे अशा विचाराने एक दिवस आम्ही गिरगावातल्या त्यांच्या घरी गेलो. मी त्यापूर्वी गिरगावातल्या जितक्या लोकांकडे गेलो होतो ते सगळे सुप्रसिध्द 'बटाट्याच्या चाळी'ची आठवण करून देणा-या जुनाट चाळींमध्ये रहात असत. त्यामुळे अख्खे गिरगाव म्हणजे 'चाळ नावाच्या वाचाळ वस्तीं'चा मोठा समूह असावा असा माझा ग्रह झाला होता. दामल्यांच्या घरापर्यंत पोचण्याआधी त्यांच्या इमारतीमधल्या काळोखात दडलेल्या जिन्याच्या पाय-या चढतांना माझा तो ग्रह जास्त दृढ झाला,

त्यांच्या घराच्या दरवाजातून आत प्रवेश करताच मात्र मी थोडासा भांबावलो. त्या काळात आम्ही रहात असलेल्या वन रूम किचनच्या मानाने तो प्रशस्त असा सेल्फ कंटेन्ड फ्लॅट होता. 'इंटिरियर डेकोरेशन' हा शब्द अजून माझ्या ओळखीचा झालेला नव्हता, पण त्यांच्या दिवाणखान्यातले फर्नीचर, त्याची मांडणी, जमीनीवर अंथरलेला गालिचा, खिडक्यांचे पडदे वगैरे सगळे मला कलापूर्ण आणि आकर्षक दिसत होते. जयश्रीताईंनी सुहास्यवदनाने आणि मनःपूर्वक आपुलकीने आमचे स्वागत केले. आम्हाला आमच्या अगांतुकपणाची जाणीव करून दिली नाही. त्या वेळी सुधीरही घरात होते. त्यांनीही आमचे औपचारिक स्वागत केले.

'पिटातल्या शिट्ट्या' वाचून सुधीर दामले यांची जी प्रतिमा माझ्या मनात तयार झाली होती त्यात ते खूप खेळकर, मिश्किल स्वभावाचे आणि बोलघेवडे असतील असे मला वाटत होते. शिवाय त्यांच्याकडे मनोरंजनाच्या विश्वातल्या बातम्या आणि घडामोडी वगैरेंचा खजीना होता. त्यांच्याशी गप्पा मारतांना आपल्याला खूप मजा येईल, काही 'अंदरकी बातें' कळतील अशी आशा मला वाटत होती. त्यांच्या स्वतःच्या वर्तुळात ते बरेचसे माझ्या कल्पनेतल्यासारखेच असतात असे मला नंतर कळले. पण बहुधा त्यांच्या 'इनर सर्कल'मध्ये कुणाही सोम्यागोम्याला सहजासहजी प्रवेश मिळत नसावा. आम्ही त्यांच्या घरी गेलो तेंव्हा परस्परांना नमस्कार वगैरे उपचार झाल्यानंतर जयश्रीताई अलकाला घरात बोलावून घेऊन गेल्या. तिकडे गेल्यावर माहेरच्या मंडळींबद्दल आणि पूर्वीच्या आठवणीवर त्यांच्या गप्पा रंगल्या. मी त्यातल्या कोणालाच ओळखतही नव्हतो त्यामुळे मला त्यात रस नव्हताच. मी हॉलमधल्या सोफ्यावर बसून राहिलो.

सुधीर थोडा वेळ कसलीशी कागदपत्रे वाचत बसले होते आणि कोणाकोणाशी टेलीफोनवर बोलत होते. त्यानंतर ते उठून बाहेर चालले गेले, कदाचित त्यांच्या दुकानावर किंवा आणखी कोठे गेले असतील. समोर बसलेल्या माझ्या अस्तित्वाची त्यांनी फारशी गंभीर दखल घेतली नाही असे मला जाणवले. मीसुध्दा त्या काळात वडीलधारी माणसांशी बोलायला थोडा बिचकत होतो, त्यामुळे मी ही आपले तोंड उघडले नाही. समोर पडलेल्या वर्तमानपत्रांची पारायणे करीत आणि खिडकीतून दिसणारी गिरगावरोडवरली रहदारी पहात राहिलो. त्यानंतर सुरुवातीला काही ना काही कारणाने किंवा निमित्याने आम्ही वरचेवर त्यांच्या घरी जात होतो. दर वेळी जयश्रीताई आमचा चांगला पाहुणचार करायच्या. सुधीर मात्र कधी घरी भेटत, कधी त्यांची भेटही होत नसे. ते जिथे रहात होते त्याच बिल्डिंगच्या तळमजल्यावर त्यांचे ऑफीस कम दुकान होते, कदाचित आतल्या बाजूला छपाईची यंत्रसामुग्रीसुध्दा असेल. 'नवीन किताबखाना'चा व्यवहार तेथून चालत असे. हेच त्यांचे मुख्य ऑफीस होते की ती एक ब्रँच होती हे मला समजले नाही. त्या गाळ्यावर 'एन के प्रिंटर्स' असा बोर्ड होता. कधीकधी सुधीरांचे मँनेजर आतल्या बाजूला बसलेले दिसत. त्यांच्या घरी जातांना किंवा परत जातांना मी बाहेरूनच हात हलवून त्यांना अभिवादन करत असे. पुढे माझे काम आणि प्रपंच यात मी गुंतून गेलो आणि हळूहळू अलकाला मुंबईतले रस्ते आणि बसेस, टॅक्सी वगैरेंची चांगली माहिती झाली. अलका एकटीच किंवा मुलांना घेऊन जयश्रीताईंना भेटून येऊ लागली. त्यानंतर तिच्याबरोबर माझे दामल्यांच्या घरी जाणे कमी कमी होत बंद झाले. सुधीर आमच्या घरी कधी आलेच तरी त्या भागात त्यांची इतर कामे असत आणि ती करतांना ते आमच्याकडे उभ्याउभ्याने भेटून जात असत. आमच्या दोघांच्या एकत्र बसून दिलखुलास अशा गप्पा कधी झाल्याच नाहीत.  

असे असले तरी त्यांचे नाव मात्र आमच्या घरातल्या बोलण्यामध्ये नेहमी निघायचे. त्यांनी मार्मिकमध्ये लिहिणे थांबवले की मी मार्मिक वाचणे बंद केले ते आता आठवत नाही, पण माझे 'पिटातल्या शिट्ट्या' वाचणे कधीच थांबले होते. तरीही इतर वर्तमानपत्रे, मासिके वगैरेंमध्ये त्यांचे लेख, फोटो किंवा उल्लेख अधून मधून नजरेला पडत असत. कधी ते कोणाची मुलाखत घेतांना किंवा कोणाला मुलाखत देतांना किंवा एकाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचे दूरदर्शनवर अचानक दर्शन घडत असे. 'नाट्यदर्पण' या नावाचे नावाप्रमाणेच मराठी नाट्यसृष्टीला वाहून घेतलेले एक सुरेख मासिक त्यांनी सुरू केले आणि काही काळ चालवले. त्याचा दिवाळी विशेषांक तर फारच वाचनीय असे. मुंबईतल्या दादर आणि गिरगाव या भागातच त्या काळी मराठी नाटकांचे प्रयोग होत असत. आम्ही तिथून खूप दूर रहात असल्यामुळे आम्हाला नाटक पहायला तिकडे जाणे कठीण होते आणि ते संपल्यानंतर मध्यरात्री परत घरी जाणे त्याहूनही कठीण होते. तरीही आम्ही नाट्यदर्पणचे अंक आवर्जून वाचत असू आणि सुटीच्या दिवशी जमतील तेवढी नाटके पहात असू.

त्या काळात फिल्मफेअर हे मॅगेझिन अतीशय लोकप्रिय होते आणि फिल्मफेअर अॅवॉर्ड्स म्हणजे ऑस्कर अॅवॉर्ड्सच्या तुल्यबळ अशी भारतातली बक्षिसे होती. त्यांचा वितरण समारंभसुध्दा मोठ्या झोकात साजरा केला जात असे. आजकाल दर वर्षी अशा प्रकारची पंधरावीस अॅवॉर्ड्स दिली जातात आणि त्यांचे संयोजन कुठल्या ना कुठल्या परदेशातल्या ठिकाणी अतीभव्य प्रमाणात केले जाते. दर शनिवारी किंवा रविवारी त्यातला निदान एकादा तरी समारंभ टेलीव्हिजनवर दाखवला जातो. त्यामुळे आता त्याचे खास महत्व वाटत नाही. पण तीस पस्तीस वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवरील कलाकारांचे कौतुक करण्याची कसली योजनाच नव्हती. त्या काळात सुधीर दामले यांनी नाट्यदर्पण मासिकातर्फे असे अॅवॉर्ड्स समारंभ साजरे करणे सुरू केले आणि त्यासाठी दरवर्षी एका नाट्यदर्पण रजनीचे संयोजन केले.

ही नाट्यदर्पण रजनी मात्र आम्ही न चुकवता पहात होतो. तिची तारीख समजली की कॅलेंडरवर ठळक खूण करून तो दिवस आणि रात्र फक्त या कार्यक्रमासाठी आधीपासून राखून ठेवत असू. हा कार्यक्रमसुध्दा अत्यंत प्रेक्षणीय आणि सुश्राव्य असायचा. रंगमंचावर तसेच तिच्या पार्श्वभूमीवर चोख काम विविध करणा-या रंगकर्मींना पारितोषिके देऊन त्यांचा यथोचित सन्मान त्यात केला जात असेच, शिवाय विविध प्रकारचे आणि नाविन्याने भरलेले अत्यंत अभिरुचीसंपन्न आणि मनोरंजक असे लहान लहान कार्यक्रमांचे तुकडे त्या पारितोषिक वितरण समारंभाच्या मागे पुढे सादर केले जात असत. स्व.पु.ल.देशपांडे किंवा हेमा मालिनी यासारखी त्यांच्या क्षेत्रातील सर्वोच्च स्तरावरली एकादी सुप्रसिध्द व्यक्ती दर वर्षी मुख्य अतिथी असायची. नाट्यक्षेत्रामधले सारे प्रमुख कलाकार या सोहळ्याला हजर रहायचे आणि त्यातल्या लहानशा मनोरंजक आयटममधले छोटेसे काम समरस होऊन करायचे. त्या रात्री पुण्यामुंबईतल्या कुठल्याही सभागृहात नाटकाचा कार्यक्रम होत नसे असे मी ऐकले होते. नाट्यदर्पणच्या कार्यक्रमाची व्याप्ती, त्यातले वैविध्य आणि रंजकता दर वर्षी वाढतच गेली. इतका वैशिष्ट्यपूर्ण असा कुठल्याही भाषेमधला दुसरा कोणताही कार्यक्रम पहाण्याची संधी मला पुढेसुद्धा कधीच मिळाली नाही असे मी ठामपणे सांगू शकेन.  

इतके सुरेख आयटम्स फक्त एका प्रयोगासाठी बसवणे आणि त्यांची रंगीत तालीम घेणे वगैरे कामे सुधीर कशी करवून घेत असतील हे तेच जाणोत. यात प्रसिध्दीच्या शिखरावर असलेले मुरब्बी कलाकार असायचे आणि उदयोन्मुख किंवा अगदी नवे कलाकारही असायचे. या सर्वांना एकत्र आणणे किती कठीण काम असेल? अर्थातच यासाठी मोठे टीमवर्क असणार यात शंका नाही, पण ते सुरळीतपणे जुळवून आणण्यासाठी असणारे केंद्रीय नियोजन दामले कुटुंबीयच करत असत. या महत्कार्याचे मंचावरील संचालन या क्षेत्रामधील सुप्रसिध्द अशा इतर व्यक्ती करत असल्या तरी त्यांच्याही मागले खरे मुख्य सूत्रधार सुधीर दामले हेच असायचे हे समजून येत असे. पण रंगमंचावरील त्यांचा प्रत्यक्ष वावर मात्र अगदी मोजून मापून असायचा. त्यांच्या भाषणात कधीही आत्मप्रौढी नसायची, किंवा ते इतरांनाही त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळू देत नसत. नाट्यसृष्टी आणि त्यातले कलाकार यांच्यासंबंधी त्यांच्या मनात असलेले प्रेम, आत्मीयता तसेच तळमळ ते व्यक्त करून दाखवत असत. नाट्यविश्वाकडून त्यांना मिळणारा प्रतिसादसुध्दा अचंभित करणारा होता. त्यातले झाडून सारे प्रथितयश रंगकर्मी व्यावसायिक रंगभूमीवरचे काम (आणि त्याबरोबर त्यातून होणारी प्राप्ती) सोडून एक रात्र त्या सोहळ्याला उपस्थित रहात हे कौतुक किंवा आश्चर्य करण्यासारखे असे. पहायला गेल्यास सुधीर दामले हे नट, निर्माता, दिग्दर्शक वगैरे कोणी नव्हते किंवा त्यांच्या मालकीची नाट्यगृहे नव्हती, तरीही त्यांच्या हातात एवढे सामर्थ्य कशामुळे असायचे हे कोडे मला अनेक वेळा पडत असे.

नाट्यदर्पण रजनी या वार्षिक सोहळ्याखेरीज ते इतर काही नाट्यमहोत्सवांचे आयोजन करीत असत. एकाच सभागृहात एकाद्या वीक एंडच्या दोन अडीच दिवसात एका पाठोपाठ एक अशी आठ दहा संपूर्ण नाटके पहाण्याची संधी त्यात रसिकांना मिळत असे. नाटकांची निवड करतांना काही सामाजिक, काही रहस्यमय, तर काही जुनी पौराणिक कथेवरील संगीत नाटके अशी व्हरायटी त्यात मिळत असे. आमच्यासारख्या भुकेल्या प्रेक्षकांना ही पर्वणी वाटत असे. नाट्यदर्पण रजनी आणि हे नाट्योत्सव या दोन्ही कार्यक्रमात त्यातील कलाकारांना अगदी जवळून पहाण्याची संधी आम्हाला मिळत असे. कधी बॅकस्टेजवर जाऊन त्यांना भेटायला किंवा त्यांच्या संगतीत चहापाणी, भोजन वगैरे करायलासुध्दा मिळाले. "अमक्या प्रसिद्ध नटीने आमच्या डब्यातल्या तिखटमिठाच्या पु-या मिटक्या मारत खाल्या किंवा तमक्या वयस्क नटाला मी एकदा हाताशी धरून थोडे अंतर चालवत नेले." असल्या बढाया मारायची सवय मला नसली तरी कधी कधी तसे घडत होते आणि त्या आठवणी आपसूकच मनात जपून ठेवल्या गेल्या.

सुधीर दामले अनेक वर्षे मुंबईला रहात असले तरी पुण्याला त्यांचा वडिलोपार्जित वाडा होता. मुंबई सोडून कायमचे तिकडे जाऊन रहायचा निर्णय त्यांनी घेतला. त्या वाड्याची पुनर्रचना करून तिथे मोठी इमारत बांधली. त्यातला तळमजला बँका आणि इतर व्यावसायिकांना देऊन वरील दोन मजल्यांवर मोठे हॉल आणि राहण्यासाठी फ्लॅट बांधले. सुदर्शन या नावाने प्रसिध्द झालेला हा रंगमंच पुण्यामधील हौशी कलाकारांसाठी एक अत्यंत महत्वाचे ठिकाण झाले. त्याना फक्त एक मंच मिळाला असे म्हणण्यापेक्षा त्यातून प्रायोगिक नाटकांची एक सांस्कृतिक चळवळ (मूव्हमेंट) उभी राहिली असे म्हंटल्यास वावगे होणार नाही.  सुधीररावांचे बंधू रवी आणि वहिनी शुभांगीताई यांच्या पुढाकारामधून हे घडत असले तरी त्यामागची प्रेरणा, मार्गदर्शन आणि पाठिंबा सुधीरांचाच असणार.

सुधीर दामले यांचा शष्ट्यब्दपूर्तीचा उत्सव त्यांनी पुण्यातल्या एका चांगल्या हॉटेलात साजरा केला होता. त्या कार्यक्रमाला आम्ही मुंबईहून तिथे गेलो होतो. त्यांना अभीष्टचिंतन करण्यासाठी नाट्यक्षेत्रामधले कित्येक दिग्गज या कार्यक्रमाला आले होते. त्या अविस्मरणीय अशा संध्याकाळी जमलेल्या पाहुण्यांसाठी सुग्रास भोजनाखेरीज संगीताचीही मेजवानी होती. त्यात शास्त्रीय संगीतही होते आणि चक्क बैठकीची लावणी ठेवली होती. (कदाचित अप्रत्यक्षपणे सुधीररावांना उद्देशून गायिलेल्या) "पिकल्या पानाचा देठ बाई हिरवा" या लावणीनंतर जो टाळ्यांचा कडकडाट झाला त्याने सभागृह दुमदुमून गेले. अशा प्रकारचा वेगळेपणा आणि रसिकता फक्त तेच दाखवू शकतील. अशा पध्दतीची आणि इतकी रंगलेली साठी शांत मी तरी कधी आणि कुठे पाहिली नाही. अशा कार्यक्रमासाठी लागणारा दिव्य स्पर्श फक्त सुधीरांच्याचकडे आहे.

मागील आठवड्यात सुधीर आणि जयश्री यांच्या विवाहाचा सुवर्णमहोत्सवी सोहळा साजरा करण्यात आला. हा घरगुती स्वरूपाचा कार्यक्रम त्यांच्याच सुदर्शन हॉलमध्ये ठेवला होता. अगदी जवळचे असेसुध्दा शंभरावर आप्तस्वकीय त्याला उपस्थित होते. त्यातले बहुतेक लोक ज्येष्ठ नागरिक असणार हे अपेक्षितच होते. वयोमानानुसार सुधीरांची हालचाल मंद झाली होती. पण सर्वांना उद्देशून केलेल्या छोट्याशा भाषणात त्यांनी आपले मनोगत म्हणजे मुख्यतः आभार प्रदर्शन मोजक्या शब्दात खणखणीत आवाजात व्यक्त केले. "या निमित्याने जमलेल्या आप्तेष्टांना एकमेकांना भेटण्याची आणि गप्पागोष्टी करण्याची संधी देण्यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे. त्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून हा औपचारिक भाग आम्हाला शक्य तितक्या लवकर आटोपायचा आहे." असे सांगून त्यांनी त्यांची स्तुती करण्याची भाषणे करण्याची संधी कोणालाही दिली नाही. एवढे होईपर्यंत पाहुण्यांना सूप देणे सुरू झालेले होते आणि वरील मजल्यावर स्नेहभोजन तयार असल्याची वर्दी दिली गेली. आलेल्या प्रत्येक पाहुण्याने आल्याआल्या त्यांची भेट घेऊन अभीष्टचिंतन केलेले होतेच. हळूहळू सारे लोक भोजनकक्षात गेले आणि ओळखीतल्या इतर पाहुण्यांबरोबर गुजगोष्टी करत रेंगाळत राहिले. या कार्यक्रमाला येतांना कोणीही भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ आणू नये असे आमंत्रणपत्रिकेत लिहिलेले होते आणि त्याचे पालन झाले होते. आयोजकांनी मात्र आलेल्या पाहुण्यांना परत जातांना आभारपत्र आणि नव्या वर्षाचे कॅलेंडर दिले.

सुधीररावांच्याबद्दल मनांत खूप आदरभावना होतीच, त्यात आणखी एक तुरा खोवला गेला.  
--------------------------------------------------------------------------------------------------
Facebook status on 18/8/2016

तीस चाळीस वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवरील कलाकारांचे कौतुक करण्याची कसली योजनाच नव्हती. त्या काळात सुधीर दामले यांनी नाट्यदर्पण मासिकातर्फे असे अॅवॉर्ड्स समारंभ साजरे करणे सुरू केले आणि त्यासाठी दरवर्षी एका भव्य नाट्यदर्पण रजनीचे संयोजन केले. ... इतका वैशिष्ट्यपूर्ण असा कुठल्याही भाषेमधला दुसरा कोणताही कार्यक्रम पहाण्याची संधी मला पुढेसुद्धा कधीच मिळाली नाही असे मी ठामपणे सांगू शकेन. ..... नाट्यदर्पण रजनी आणि हे नाट्योत्सव या दोन्ही कार्यक्रमात त्यातील कलाकारांना अगदी जवळून पहाण्याची संधी आम्हाला मिळाली ती फक्त श्री.सुधीर दामले यांच्यामुळेच.  

निवडक आनंदघन Wordpress link 


Wednesday, November 21, 2012

कॉमन मॅन, सायंटिस्ट, इंजिनियर आणि एक कोडे



काही दिवसापूर्वी मिसळपाव या संस्थळावर एक सोपे वाटणारे कोडे दिले गेले होते. ते असे होते, "वीस लिटरच्या एका टाकीला खाली तोटी आहे. पूर्ण भरलेल्या टाकीतून तोटी उघडल्यावर एका मिनिटात २ लिटर पाणी कमी झाले. सर्व टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल?"


सर्वसामान्य माणूस असा विचार करेल, "दोन लिटर पाणी निघायला १ मिनिट लागले, या गतीने वीस लिटर पाणी दहा मिनिटात बाहेर पडेल."

हे प्राथमिक शाळेतले साधे त्रैराशिक झाले, यात कोडे कसले आले? टाकीमधील पाण्याची पातळी जसजशी खाली जाईल तसतसा पाण्याचा वेग कमी कमी होत जातो हे आपल्याला दिसतेच, त्यामुळे हे उत्तर बरोबर असणार नाही.

तोटीमधून बाहेर पडणा-या पाण्याचा वेग टाकीमधील पाण्याच्या पातळीच्या उंचीच्या वर्गमूळाच्या समप्रमाणात असतो ( उंची चौपट असली तर वेग दुप्पट असेल) आणि टाकीमधील पाण्याच्या उंचीत दर क्षणाला होणारी घट (dh) त्या वेगाच्या समप्रमाणात असते (पाण्याचा वेग दुप्पट झाला तर पातळी दुप्पट वेगाने खाली येते). म्हणजेच ती उंचीच्या वर्गमूळाच्या समप्रमाणात असते. असे त्याचे शास्त्र आहे. जसजशी पाण्याची पातळी खाली जाऊन उंची कमी होत जाईल तसतसा तोटीमधून बाहेर निघणा-या पाण्याचा वेगसुध्दा कमी होत जाईल. जेंव्हा त्याची उंची शून्याच्या जवळ जाईल तेंव्हा त्याचा टाकीच्या बाहेर जाण्याचा वेगही शून्याच्या जवळ पोचेल पण शून्याला गाठण्यासाठी अनंत काळ लागेल. असे सायंटिस्ट सांगतील. तत्वतः हे बरोबर आहे. प्रत्यक्षात सुध्दा टाकीच्या तळाशी असलेला पाण्याचा पातळसा थर त्याला चिकटून राहतो. तो गुरुत्वाकर्षणाने कधीच वाहून जात नाही. या परिस्थितीत गुरुत्वाकर्षणाचा जोर अत्यंत क्षीण झालेला असतो आणि पाण्याचे सरफेस टेन्शन, व्हिस्कॉसिटी वगैरेंचा प्रभाव जास्त झाल्यामुळे टाकीच्या तळाशी थोडे पाणी शिल्लक असले तरी तोटीमधून पाणी बाहेर निघणे बंद होते. हे घडण्यासाठी अनंत काळापर्यंत थांबायची गरज नाही. यामुळे हे उत्तरसुध्दा बरोबर नाही.

माझ्यासारखा एक इंजिनियर यातले कोणतेही उत्तर देणार नाही. आळशीपणा करून मी एक सोपे तोंडी गणित केले. पाण्याचा तोटीमधून बाहेर पडण्याचा वेग सुरुवातीला एका मिनिटाला दोन लीटर असा होता आणि अखेरीस तो शून्य होणार, म्हणजे सरासरीने दर मिनिटाला एक लीटर एवढा धरला तर वीस लीटर पाणी वीस मिनिटात बाहेर पडेल. हे उत्तर मी टंकणार होतो, पण त्यापूर्वी आधी आलेली उत्तरे वाचली. त्यात वर दिलेली उत्तरे होतीच, शिवाय मौजमजा म्हणून या प्रश्नाला अनेक फाटे फोडलेले होते. ते पाहून मी आपला बेत बदलला आणि कॉलेजमध्ये असतांना ऐकलेले एक मजेदार असे अशा प्रकारचे उदाहरण दिले.
पण मला असेही जाणवले की काही लोकांना बरोबर उत्तर जाणून घेण्याची इच्छा आहे. मला आलेल्या एका संदेशात असे लिहिले होते, "उंची नसल्यामुळे उत्तर कसे काढणार?? मी Bernoulli principle चा विचार केला पण त्यासाठी उंची लागेलच ना?" त्यामुळे मला या विषयावर थोडे खोलात जाऊन काम करण्याची प्रेरणा मिळाली. कोडे घालतांना पाण्याची उंची दिलेली नाहीच, टाकीचा आकारही दिलेला नाही. ती त्रिकोणी, चौकोनी, गोल अशा कोणत्या आकाराची आहे, ती उभी आहे की पसरट आहे तेही ठाऊक नाही. शिवाय ते पाणी समुद्रातले आहे की नदीतले, त्याचे तपमान किती आहे वगैरे माहितीही नाही. प्लँटचे डिझाईन करतांना अशा अनेक गोष्टींचा उपयोग केला जातो.

पण पुरेशी माहिती नाही म्हणून इंजिनियर अडून बसत नाही. जेवढी माहिती उपलब्ध असेल तिचा पुरेपूर उपयोग करायचा आणि जी नसेल त्याबद्दल आपल्या अनुभवावरून अंदाज बांधायचा, काही बाबी गृहीत धरायच्या आणि पुढे जायचे असे त्याने करायचे असते. भरलेली टाकी रिकामी होईपर्यंत तिच्यात खारे, गोडे, थंड, गरम वगैरे जे पाणी आहे, ते जसे असेल तसेच राहणार, त्याचे गुणधर्म बदलणार नाहीत असे गृहीत धरायला काहीच हरकत नाही. टाकीचा आकार चित्रात दाखवल्याप्रमाणे कसलाही असणे शक्य असले तरी प्रत्यक्षात बहुतेक ठिकाणी त्या सिलिंडर किंवा चौकोनी आकाराच्याच असतात. या आकारांमध्ये टाकीचे क्षेत्रफळ (क्रॉस सेक्शन एरिया) तळापासून वरपर्यंत सारखेच असते. त्यामुळे गणित मांडणे सोपे होते.
टाकीचे घनफळ २० लिटर आहे आणि पहिल्या एका मिनिटात २ लिटर पाणी तोटीमधून बाहेर पडले एवढी माहिती दिली आहे. याचाच अर्थ पहिल्या एक मिनिटात एक दशांश एवढे पाणी बाहेर पडले आणि त्यामुळे पाण्याची पातळी एक दशांशाने खाली आली असा होतो. मी टाकीची उंची दहा विभागात (झोन्समध्ये) विभागली. प्रत्येक विभागातल्या पाण्याची तळापासूनची उंची वेगळी असल्यामुळे तोटीमधून बाहेर पडण्याचा वेगही त्यानुसार निराळा असणार, पण तो उंचीच्या वर्गमूळाच्या प्रमाणात असणार. दिलेल्या माहितीमधील (पहिल्या मिनिटातील) वेगाशी तुलना करून तो वेग मिळाला की तेवढ्या वेगाने त्या विभागातील सर्व पाणी बाहेर येण्यासाठी किती वेळ लागेल हे गणित करणे अगदी सोपे आहे. असा रीतीने सर्व दहा भागांना लागणारा वेळ काढला आणि त्याची बेरीज करून टाकी रिकामी होण्याला लागणारा वेळ मिळाला.

हे करतांना तीन निरनिराळ्या गोष्टी गृहीत धरल्या.

१. प्रत्येक विभागाच्या वरील टोकाएवढी त्यातील पाण्याची उंची धरून त्यामुळे पाण्याचा जेवढा वेग येईल तेवढ्याच वेगाने त्या विभागातले सर्व पाणी बाहेर आले. (हे पूर्णपणे खरे नाही, पण सोपे आहे.)

२. प्रत्येक विभागाच्या मध्यपातळीएवढी त्यातील पाण्याची उंची धरून त्यामुळे पाण्याचा जेवढा वेग येईल तेवढ्याच वेगाने त्या विभागातले सर्व पाणी बाहेर आले. (हे सत्यपरिस्थितीच्या किंचित अधिक जवळ आहे)

३. प्रत्येक विभागाची मध्य पातळी ठरवतांना त्यांच्या उंचींच्या वर्गमूळांचा (रूट मीन स्क्वेअर्स) विचार करून जी उंची निघते तेवढी त्यातील पाण्याची उंची धरून त्यामुळे पाण्याचा जेवढा वेग येईल तेवढ्याच वेगाने त्या विभागातले सर्व पाणी बाहेर आले. (हे सत्यपरिस्थितीच्या जास्त जवळ आहे)
यांची उत्तरे अनुक्रमे १५.८८ मिनिटे, १९.४९ मिनिटे आणि १७.६३ मिनिटे इतकी आली.

यातील शेवटच्या एक दशांश (सर्वात तळामधील) विभाग रिकामा होण्यास लागणारा वेळ अनुक्रमे ३.१६, ६.१६ आणि ४.३६ इतका आहे. वरचे नऊ विभाग अनुक्रमे १२.७१, १३.३२ आणि १३.२७ मिनिटात संपले. तीन्ही उदाहरणांमध्ये हे आकडे जवळ जवळ सारखे आहेत.
टाकी रिकामी होण्यासाठी किती वेळ लागेल याची माहिती किती अचूक असायला हवी आणि ती काढण्यासाठी किती आटापिटा करावा लागणार आहे या मुद्यांचा सापेक्ष विचार करून योग्य त्या पध्दतीने ते गणित मांडले आणि सोडवले जाते.

यात आणखी सूक्ष्म सुधारणा करायची असल्यास टाकीमधील पाण्याच्या स्तंभांचे (कॉलम्सचे) शंभर, हजार किंवा लाख विभाग करता येतील, प्रत्येक वेळी तळामधील विभाग शून्याच्या अधिकाधिक जवळ जाईल आणि तो रिकामा होण्यास लागणारा वेळ वाढत जाऊन तो अनंताच्या दिशेकडे जाईल. पण त्या परिस्थितीत गुरुत्वाकर्षणाचा जोर अत्यंत क्षीण आणि पाण्याचे सरफेस टेन्शन, व्हिस्कॉसिटी वगैरेंचा प्रभाव पडत होत असल्यामुळे त्या गोष्टी गणितात आणाव्याच लागतील. अगदी 'बालकी खाल' काढायची झाल्यास टाकीमधील पाण्याची वरची पातळी आणि तोटीची पातळी या ठिकाणी वातावरणातील हवेचा दाब आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण सुध्दा सूक्ष्म विचार करता किंचित वेगळे असते याची दखल घेता येईल, पण हे म्हणजे 'पाय'चे उत्तर तीन पूर्णांकानंतर दिलेल्या दशांश चिन्हापुढे शेकडो, लाखो आकड्यापर्यंत काढण्याइतके निरर्थक आहे.



Thursday, November 15, 2012

केवढा चांगुलपणा ?

स्वस्थ बसून न राहता काही काम करावे असे वाटावे हा माणसाचा एक चांगला गुण आहे, ते काम स्वतःसाठी न करता दुस-यासाठी करावेसे वाटणे त्याहून चांगले आणि दुस-यासाठी केलेले काम उत्कृष्ट प्रतीचे व्हावे असे वाटणे हा तर दुर्मिळ असा सद्गुण आहे. त्यामुळे दुसरा माणूस आनंदी होईल आणि त्याच्या आनंदामधून त्या सद्गुणी माणसाला समाधान वाटेल. अशा प्रकारे दोघेही सुखी होतील. याची पुनरावृत्ती होत गेली तर सारा समाज सुखी होईल. असे तात्विक दृष्ट्या म्हणता येईल. पण प्रत्यक्षात कधी कधी तसे घडत नाही. करायला जावे (चांगले) एक आणि तसे न घडता व्हावे भलतेच असा प्रकार होतो. प्रभाताई आणि प्रमोद यांच्या बाबतीत असेच झाले.

प्रभाताई ही प्रमोदची सर्वात थोरली बहीण होती आणि त्यांच्या वयात बरेच अंतर होते. लहानग्या प्रमोदला प्रभाताईंनी तिच्या अंगाखांद्यावर खेळवले होते आणि प्रमोदला समज आल्यापासून तो तिला घरातल्या एकाद्या मोठ्या व्यक्तीसारखा मान देत आला होता. दोघेही मोठे झाले, त्यांनी आपापले संसार थाटले, त्यांचे एकमेकांकडे जाणे येणे होत राहिले. प्रभाताई अशीच एकदा प्रमोदकडे थोडे दिवस रहायला आली होती. तिचा सारा जन्म लहान गावातल्या मध्यमवर्गीय घरात गेला होता, तिथे तिला घरातली सगळी कामे करावी लागत होती, पण प्रमोदला त्या मानाने जरा चांगले दिवस आले होते. आपल्या बहिणीने आपल्या घरी चार दिवस चांगले ऐशोआरामात रहावे, तिला कसलेही कष्ट पडू नयेत असे प्रमोदला वाटत होते. घराची साफसफाई, धुणी भांडी वगैरे कामे करण्यासाठी ठेवलेल्या कामवाल्या बायका दिवसातून दोन वेळा येऊन ती सर्व कामे करून जात असत. श्रम आणि वेळ वाचवणारी स्वयंपाकघरातील जेवढी उपकरणे आणि यंत्रे बाजारात आली असतील त्यातली बहुतेक सगळी प्रमोदच्या घरी होती. त्यामुळे स्वयंपाकाचे कामसुध्दा बरेच सोपे झाले होते. घरातले कोणीही प्रभाताईला कसल्याच कामाला हात लावू देत नव्हते. तिने दिवसभर बसून किंवा वाटल्यास लोळत राहून पडल्या पडल्या आराम करावा, टीव्हीवरील कार्यक्रम पहावेत, रेडिओ किंवा टेपरेकाँर्डवर गाणी ऐकावीत, पुस्तके आणि मासिके वाचावीत, वाटल्यास आजूबाजूला फेरफटका मारून यावा, देवळात जाऊन यावे अशी प्रमोदची विश्रांतीची कल्पना होती. पण प्रभाताईच्या मनात वेगळ्या कल्पना होत्या. तिच्या दृष्टीने ज्ञान, मनोरंजन, अध्यात्म वगैरे गोष्टी चवीपुरत्या ठीक होत्या. दिवसातला सगळा वेळ त्यात घालवणे तिला कठीण जात होते. आयुष्यभर ती घरातली सगळी कामे आनंदाने करत आली होती. आतासुध्दा भावाच्या घरातही निदान थोडेसे काम केल्याखेरीज तिला चैन पडत नव्हती, पण कोणीही तिला काहीच करू देत नव्हते. प्रमोद आणि प्रतिभाला काय वाटेल अशा विचाराने ती आपल्या मनातली बेचैनी दाखवत नव्हती, आपण तिथे मजेत असल्यासारखी वागत होती.

एकदा असे झाले की प्रभाताईचा गुरुवारचा उपास असल्याने तिला संध्याकाळी जेवायचे नव्हते. हे समजल्यावर तिच्या उपासाच्या फराळासाठी प्रतिभाने साबूदाणा भिजवून ठेवला. अचानक काही आवश्यक अशा कारणाने तिला एका मैत्रिणीकडे जाणे आवश्यक झाले. प्रभाताईंना सोबत नेले तर त्यांना दगदग झाली असती, शिवाय ऑकवर्डही वाटले असते. त्यांना घरी एकटीने बसवून ठेवणेही प्रतिभाला प्रशस्त वाटले नाही. तिने फोनवर प्रमोदशी बोलून घेतले आणि काय करायचे ते ठरवले. प्रमोद ऑफीसमधून परत यायच्या वेळी ती तयार होऊन बसली आणि तो घरी येताच मैत्रिणीकडे जाण्यासाठी घराबाहेर पडली.

त्या दिवशी प्रमोदला त्याचे सर्व काम संपवण्यासाठी ऑफीसमध्ये जास्त वेळ थांबणे शक्य नव्हते. तिथली एक दोन कामे त्याच्याबरोबर घरी आली. त्यांचा शांतपणे अभ्यास करून आणि त्यावर विचार करून त्याला निर्णय घ्यायचा होता. घरी आल्यावर त्याने कपडे बदलले आणि बॅग उघडून तो कामाचे कागद बाहेर काढणार होता तेवढ्यात त्याला प्रभाताईची हाक ऐकू आली. आपल्याला नको म्हणणारे कोणी नाही असे पाहून प्रभाताई स्वयंपाकघरात गेल्या होत्या. त्यांची हाक ऐकून प्रमोद लगेच तिथे गेला. तिने साबूदाण्याची खिचडी करण्याची तयारी केली होती आणि त्यासाठी तिला कढई पाहिजे होती. त्याच्या स्वयंपाकघरात ओट्याच्या खाली खण करून त्यात भांडी ठेवण्याची व्यवस्था होती आणि काही डबे ठेवले होते. ओट्यापासून दोन हात मोकळी जागा सोडून वरच्या बाजूला कप्पे केले होते आणि काही डबे त्यात ठेवले होते. ओट्याखाली ठेवलेले सामान काढण्यासाठी खाली वाकावे लागत होते आणि वर ठेवलेले सामान काढण्यासाठी स्टूलावर चढावे लागत होते. वयोमानानुसार प्रभाताईंना या दोन्ही गोष्टी करणे कष्टाचे किंवा धोक्याचे होते. तिला स्वयंपाकघरातले कसले काम न सांगण्यामागे हेही एक कारण होते. शिवाय गॅस, ओव्हन, मिक्सर वगैरेंचा वापर कसा करायचा हे तिला माहीत नव्हते.

स्वयंपाकघरात कुठे कुठे काय काय ठेवले असेल हे प्रमोदला नीटसे ठाऊक नव्हतेच. त्याने अंदाजाने कढई शोधून काढून दिली, त्याबरोबर झाराही दिला. साबूदाण्याची खिचडी कशी करतात आणि त्यासाठी कोणकोणते जिन्नस लागतात हे त्याला माहीत नव्हते आणि ते कुठे ठेवले असतील याचीही कल्पना नव्हती. स्वयंपाकघरात आणलेला प्रत्येक पदार्थ ते नाव लिहिलेल्या ठराविक डब्यातच भरून तो डबा ठराविक फडताळातल्या ठरलेल्या जागीच ठेवायचा अशी शिस्त त्यांच्या घरी नव्हती. प्रभाताईला पाहिजे असलेले जिन्नस तिलाच शोधायला सांगणे त्याला योग्य वाटले नाही. कढई मिळताच तिने शेंगदाण्याचे कूट कुठे आहे ते विचारले. तयार केलेले कूट घरात असेल की नाही याची प्रमोदला खात्री नव्हती. निरनिराळे डबे काढून ते उघडून पहातांना त्याला एका डब्यात कच्चे शेंगदाणे सापडले. त्याने ते भाजले आणि मिक्सर चालवून त्याचे कूट करून दिले. त्यानंतर तूप, जिरे, खोबरे, मीठ, साखर वगैरे एक एक गोष्टीचं नाव काढताच प्रमोद ती शोधून काढून देत राहिला, तसेच गॅस पेटवायचा, विझवायचा, त्याची आच कमी किंवा जास्त करायची वगैरे कामांसाठी तो स्वयंपाकघरात जा ये करत राहिला.
तो विचार करत होता की प्रभाताईला साबूदाण्याची खिचडी हवी आहे असे तिने तासाभरापूर्वी सांगितले असते तर प्रतिभाने ती करून दिली असती. तिला मैत्रिणीच्या घरी जायला उशीर होऊ नये म्हणून कदाचित तिने प्रतिभाला सांगितले नसेल. अजून तासाभरात प्रतिभा परत आली असती आणि तिने त्यानंतर खिचडी करून दिली असती. पण तिला यायला उशीर लागला असता तर प्रभाताईला तोपर्यंत उपाशी रहावे लागले असते. त्याला स्वतःला साबूदाण्याची खिचडी करणे येतच नव्हते. त्यामुळे ताईला जे जे भांडे किंवा जिन्नस लागेल ते ते तो शोधून देत राहिला.
सगळे काम संपले असे पाहून प्रमोदने आपली बॅग उघडून त्यातले कागद बाहेर काढले. ते वाचायला तो सुरुवात करत होता तेवढ्यात प्रभाताईने साबूदाण्याच्या खिचडीने भरलेली प्लेट आणून त्याच्या हातात दिली. तो उद्गारला, "अगं ताई, तुझा उपास आहे ना? तूच ही प्लेट घे. मी जेवणात खाईन."

संध्याकाळच्या या वेळी काही खाण्याची त्याला सवय नव्हती आणि गरजही वाटत नव्हती. उलट अवेळी जास्तीचे खाण्यामुळे रात्रीचे जेवण व्यवस्थित होणार नाही आणि पचनसंस्था नीट राहणार नाही असे त्याला वाटत असे आणि तो शक्य तोवर ते टाळत असे.

पण प्रभाताई म्हणाली, "अरे, आत्ता गरम गरम खाऊन घे. जेवणापर्यंत ती थंड होऊन गेल्यावर तिची चंव राहणार नाही."

तो म्हणाला, "ठीक आहे. तू ही प्लेट घे. मी बशीत थोडी खिचडी घेऊन खाईन."

ताई म्हणाली, "नाही रे, तुपातले पदार्थ खाऊन अलीकडे मला खोकला येतो आणि शेंगदाण्याने पित्त होते म्हणून मी खिचडी खाणं सोडलं आहे."

हा धक्का प्रमोदला अनपेक्षित होता. तो म्हणाला, "मग तू रात्री काय खाणार आहेस ? आणि ही खिचडी कुणासाठी बनवलीस ?"

ताई म्हणाली, "मी थोडी फळं आणि दूध घेईन. तुला खिचडी आवडते ना, म्हणून तुझ्यासाठी तर ही बनवली आहे."

प्रमोदने नाइलाजाने प्लेटमधून चमचाभर खिचडी उचलून तोंडात टाकली. घास खाऊन झाल्यावर "मस्त झाली आहे." असं तो सांगणार होता तेवढ्यात ताई उद्गारली, "कशी झालीय् कुणास ठाऊक!"

तो म्हणाला, "असं का म्हणतेस? किती वर्षांपासून तू खिचडी करते आहेस? ती बिघडणं कसं शक्य आहे? "

ताई म्हणाली, " फोडणीत घालायला ताजी हिरवी मिरची मिळाली असती तर चांगला स्वाद लागला असता. "

आता मात्र प्रमोदला रहावलं नाही. आपल्या हातातलं महत्वाचं काम सोडून इतका वेळ तो निरनिराळ्या वस्तू आणि जिन्नस शोधून तिला देत होता. 'मिरची' म्हंटल्यावर त्याने शोधून काढून दिलेल्या मिरच्या हिरव्या होत्या की लाल, शिळ्या होती की ताज्या इकडे त्याने पाहिले नव्हते आणि त्याने काही फरक पडेल असेही त्याला वाटले नव्हते. तेवढीच उणीव ताईने काढावी याचे त्याला आश्चर्य वाटले.

तो म्हणून गेला, "आपल्या आईबाबांनी तर असं शिकवलं होतं की समोर येईल ते अन्न पूर्णब्रह्म म्हणून खाऊन घ्यायचं असतं आणि त्याला नावं ठेवायची नसतात. त्यामुळे मी तरी असली एवढी चिकित्सा कधी केली नाही."

प्रभाताईंचा चेहेरा खर्रकन उतरला आणि त्या देवासमोर जाऊन स्तोत्र म्हणत बसल्या. प्रमोदनं आपली प्लेट बाजूला सरकवून दिली आणि ऑफीसमधून आणलेल्या कागदात डोके खुपसले. पण आपण काय वाचत आहोत ते त्याला समजत नव्हते.

प्रभाताई आणि प्रमोद दोघेही मनाने खूप चांगले होते, दोघेही आपापल्या परीने एकमेकांचा विचार करून कृती करत राहिले, पण अखेर त्यातून त्यांच्यात थोडासा दुरावाच निर्माण झाला. त्यापेक्षा त्यांनी एकमेकांना विचारून घेतले असते तर ?

Monday, November 12, 2012

दिवाळीतले फटाके



आश्विन अमावास्येच्या काळोखात दिव्यांच्या रांगा लावून 'दीपावली' साजरी करण्याची परंपरा 'दिवाळी' या सणाने सुरू झाली. त्याला शेकडो वर्षांचा काळ उलटून गेला. आजही धार्मिक परंपरा किंवा शास्त्र म्हणून दिवाळीमध्ये रोज संध्याकाळी घरोघरी तेलाच्या पणत्या लावल्या जातातच. पण विजेच्या दिव्यांचा लख्ख प्रकाश मिळण्याची सोय झाल्यानंतर निरनिराळ्या प्रकारचे आकाशकंदील आणि झगमगणा-या दिव्यांच्या माळांनी अत्यंत नेत्रदीपक अशी रोषणाई करणे सुरू झाले. आज कोणत्याही शहरात एक फेरफटका मारून पाहिल्यास त्याची प्रचीती येईल. लहान मुलांनी विजेशी खेळणे सुरक्षित नसते आणि त्यांना ते करणे शक्यही नसते म्हणून बहुतेक घरी हे काम मोठी माणसेच करतात. दिवाळीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे फराळ. पूर्वीप्रमाणे आता सगळे खाद्य पदार्थ घरी तयार करण्याची खटपट केली जात नाही. मोठ्या शहरात तर मिठायांचे इतके वेगवेगळे प्रकार आता मिळतात आणि ते आकर्षक वेष्टनांमध्ये विक्रीसाठी मांडून ठेवले जातात की दिवाळीसाठी तेच मोठ्या प्रमाणात आणले जातात. हल्लीच्या काळात वर्षभरच चांगले चुंगले खाऊन जिभेचे चोचले पुरवणे चाललेले असते. त्यामुळे दिवाळीच्या फराळाची पूर्वीसारखी अपूर्वाई राहिली नाही. या सगळ्यांच्या तुलनेत दिवाळी म्हंटले की लहान मुलांना लगेच कशाची आठवण प्रकर्षाने येत असेल तर ती फटाक्यांचीच !


पुराणातल्या कहाण्यांमध्ये फुलापानांच्या माळा, गुढ्या, तोरणे, रांगोळ्या वगैरे इतर प्रकारच्या सजावटीचे उल्लेख सापडतात, दीपज्योती तर कुठल्याही मंगल प्रसंगी आवश्यकच असते, पण गंमत म्हणून धडाडधूम आवाज करणारे फटाके उडवणे दिसत नाही. स्फोटकांचा शोध चीनमध्ये लागला आणि फटाक्यांचा उपयोगही सर्वात आधी म्हणजे सातव्या शतकात चीनमध्ये सुरू झाला. त्याचे तंत्रज्ञान तिकडून युरोपमध्ये गेले आणि त्यांनी त्यात प्रचंड प्रगती आणि सुधारणा केली. ब्रिटीशांच्या काळात त्याची भारतात आवक झाली आणि फटाके उडवणे हा कोठल्याही उत्सवाचा अविभाज्य भाग झाला. इतर समारंभ एका कुटुंबापुरते किंवा एका समूहापुरते मर्यादित असतात, पण दिवाळी हा सर्वांचाच सण असल्याने त्याचे कानठळ्या बसवणारे आवाज एकाच वेळी सगळ्या बाजूने येत राहतात.


प्रकाश आणि ध्वनि यांच्या निर्मितीमधून काही धमाल उडवण्याचा प्रयत्न दिवाळीत उडवायच्या दारूमधून केला जातो. त्यामुळे लहान किंवा मोठा आवाज करणारे फटाके आणि निरनिराळे प्रकाश उत्पन्न करणारी उत्पादने असे दोन मुख्य प्रकार यात असतात. याशिवाय आकाशात उडणारे अग्निबाण असतात, तसेच यांना एकत्र आणणारे फटाके असतात. कशात आधी अग्निबाण आकाशात उडतो आणि वर गेल्यानंतर त्याचा स्फोट होऊन धमाका होतो किंवा त्यातून चमकदार ठिणग्यांचा वर्षाव होतो. लहानशा फटाकडीपासून सुतळी बाँबसारख्या मोठ्या फटाक्यापर्यंत त्यात अनेक प्रकार असतात, तसेच फुलबाजी, भुईचक्र आणि कारंजे वगैरे निरनिराळ्या प्रकाराने प्रकाशाची आतिशबाजी केली जाते. त्यातही एकाच रंगाच्या किंवा विविध रंगांच्या ठिणग्या उडवल्या जातात.

हे सारे फटाके कोणत्या तत्वावर काम करतात हे अनेकांना ठाऊक नसते पण ते जाणून घ्यायची इच्छा असते. त्यांचे कुतूहल शमवण्याचा एक लहानसा प्रयत्न या लेखात केला आहे. आपण साधा कागद किंवा लाकडाचा तुकडा जाळतो तेंव्हा त्यांच्यामधील मुख्यतः कार्बन व हैड्रोजनच्या अणूंचा हवेमधील प्राणवायूच्या अणूंशी संयोग होऊन कार्बन डायॉक्साईड वायू आणि पाण्याची वाफ तयार होते आणि त्या रासायनिक क्रियेत या पदार्थांमधून ऊष्णता बाहेर पडते. त्यामुळे त्या ठिकाणचे तपमान वाढते आणि त्यातून निघालेल्या प्रकाशकिरणांमुळे आपल्याला जाळ दिसतो, तसेच त्यात हात घातल्यास हाताला चटका बसतो. या जळण्यात कागद किंवा लाकडामधील काही कण जळत नाहीत, त्यातले सूक्ष्म कण हवेत पसरल्यामुळे त्यातून धूर तयार होतो आणि काही कण राखेच्या रूपाने खाली राहतात. ज्वलनाची क्रिया होण्यासाठी जळणारा पदार्थ आणि प्राणवायू यांची आवश्यकता असते आणि ही क्रिया उच्च तपमानालाच होऊ शकते. यामुळे वातावरणाच्या तपमानात (रूम टेंपरेचरला) कागद किंवा कपडे ठेवल्या जागी आपोआप पेट घेत नाहीत.

गंधक, कापूर यासारखे ज्वालाग्राही पदार्थ पटकन पेटतात आणि भुरूभुरू जळतात. काही रासायनिक पदार्थांमध्ये जादा प्राणवायू असतो आणि उच्च तापमानाला तो त्यांच्यामधून बाहेर पडतो. अशी रसायने आणि ज्वालाग्राही पदार्थ यांचे मिश्रण स्फोटक बनते. त्यांचे ज्वलन होण्यासाठी बाहेरील हवेमधील प्राणवायूची आवश्यकता नसते. एका ठिणगीने त्यांच कण पेटवले की त्यांच्या ज्वलनामधून अधिकाधिक ऊष्णता बाहेर पडत जाते आणि ते जळत जातात. बंदुका व तोफा यांना उडवण्यासाठी लागणारी किंवा सुरुंगाची दारू या प्रकारची असते. दिवाळीच्या फटाक्यांमध्ये याच प्रकारची दारू सौम्य रूपात वापरली जाते.

फटाका तयार करतांना कागदाची जाड गुंडाळी करून त्यात ही दारू भरतात आणि त्याला जोडलेली एक कागदाची वात बाहेरपर्यंत ठेवली जाते. या वातीवर दारूचा पातळसा थर दिलेला असतो. ती पेटवली की हळूहळू आतपर्यंत जळत जाते. यामुळे पेटवणा-याला दूर पळायला वेळ मिळतो. कागदाच्या गुंडाळीच्या आतील दारू बाहेरील हवेशिवायच पेट घेते. त्यांच्या ज्वलनातून जे वायू बाहेर पडतात त्यांचे आकारमान मूळ स्थितीच्या शेकडो पटीने जास्त असते आणि त्यांना व्यापण्यासाठी फटाक्याच्या आत पुरेशी जागा नसल्यामुळे त्या वायूचा दाब वाढत जातो. कागदाचे वेष्टण आतल्या बाजूने जळत जाऊन कमकुवत होत जाते. अखेर आतला दाब सहन न झाल्यामुळे ते टराटरा फाटते आणि आतील वायू सर्व बाजूंनी वेगाने बाहेर पडतो. त्यामुळे हवेत कंपने निर्माण होऊन मोठा ध्वनि निघतो. हे सगळे क्षणार्धात होते. फटाक्यामधील दारूचा प्रकार आणि प्रमाण यानुसार लहान किंवा मोठा स्फोट होऊन थोडा किंवा कानठळ्या बसवणारा आवाज निघतो. अगदी लहानशा कागदाच्या दोन गोल तुकड्यांमध्ये कणभर दारू ठेवून टिकली तयार होते. ती खेळातल्या पिस्तुलात ठेऊन तिचा घोडा ओढला की पिस्तुलातला खटका दाणकन टिकलीवर आदळून तिच्यातल्या दारूचा लहानसा स्फोट होतो. अनेक फटाके एकमेकांना जोडून त्यांची माळ तयार करतात आणि त्यातले सारे फटाके एकदम न उडता ते एकामागोमाग एक करून उडावेत अशी त्यांची रचना केली असल्यामुळे ती माळ काही सेकंद किंवा मिनिटे तडतडत राहते.
फटाक्याच्या वेष्टनाची गुंडाळी करतांना तिच्या एका बाजूला मोकळी वाट ठेवली तर ज्वलनामुळे आत निर्माण झालेले वायू त्यातून वेगाने बाहेर पडतात आणि न्यूटनच्या तिस-या नियमानुसार त्याच्या प्रतिक्रियेमुळे तो फटाका उलट बाजूने दूर फेकला जातो. अग्निबाणामधील फटाक्याला खालच्या बाजूने मोकळी वाट असते. त्यातून हे ऊष्ण वायू बाहेर पडतात आणि काडीला जोडलेला फटाका आभाळात उड्डाण करतो. त्याच फटाक्यातल्या दुस-या कप्प्यात आणखी थोडी दारू भरलेली असते. बाण आकाशात उंच उडल्यानंतर ती दारू पेटते आणि तिचा स्फोट होतो.
शोभेच्या दारूला जाड वेष्टण नसते. तिचा एकदम स्फोट होऊ नये म्हणून तिच्यात काही न जळणारी रसायने किंवा धातूंचा भुगा मिसळतात. त्यांना तापवल्यावर उच्च तपमानाला त्यांचा रंग बदलतो. उदाहरणार्थ कॅल्शियमचा रंग केशरी होतो तर सोडियमचा पिवळा, तांब्याचा निळा तर बेरियमचा हिरवा. पांढरा शुभ्र प्रकाशासाठी मुख्यतः मॅग्नेशियम किंवा अॅल्युमिमियमचा वापर होतो. मॅग्नेशियम धातू स्वतःच ज्वालाग्राही असल्यामुळे त्यातूनच अत्यंत चमकदार अशा ठिणग्या पडतात. फुलबाजी पेटवली की तिच्या काडीला चिकटवलेली दारू किंवा मॅग्नेशियमची पूड जळत राहते. त्याचबरोबर या भुग्याचे कण तापून चमकतात आणि त्यांच्यामधून रंगीबेरंगी प्रकाशकिरण बाहेर पडतात. भुईचक्र तयार करण्यासाठी ही शोभेची दारू एका कागदात गुंडाळून तिचे वेटोळे लहानशा भिंगरीला चिकटवतात. त्यामुळे ती प्रकाशाचे झोत टाकत स्वतःभोवती गोल गोल फिरत राहते. एका कोनिकल आकाराच्या वेष्टनात बरीच दारू भरून ठेवली तर त्याचे झाड किंवा कारंजे होते.


फटाके तयार करतांना त्यातून होणारे स्फोट विध्वंसक होऊ नयेत इतपत लहान ठेवले असतात, पण माणसाला धाडसाचे वेड असल्यामुळे तो त्याचा आकार वाढवत जातो. असे मोठ्या आकाराचे फटाके उडवतांना पुरेशी काळजी घेतली नाही आणि कोणी त्या फटाक्याच्या अगदी जवळ आला तर स्फोटाच्या धक्क्याने त्याला इजा होऊ शकते. ढिले किंवा ज्वालाग्राही कपडे पेट घेऊन तो माणूस भाजू शकतो. फार मोठ्या आवाजाने त्याचे कान बधीर होऊ शकतात. एकादी ठिणगी डोळ्यात गेल्यास अंधत्व येऊ शकते. लहान मुले आणि वृध्द लोकांची सहनशक्ती कमी असते. त्यामुळे जो प्रखर उजेड किंवा आवाज मोठे लोक सहन करू शकतात, त्यांच्यामुळे लहान मुलांना किंवा वृध्दांना इजा होऊ शकते. पर्यावरण हा एक नवा मुद्दा अलीकडे अधिकाधिक महत्वाचा होत चालला आहे. दिवाळीनिमित्य फार मोठ्या प्रमाणात फटाके उडवले गेल्यामुळे त्यांच्या ज्वलनामधून निघालेले विषारी वायू हवेत मिसळतात आणि त्रासदायक ठरतात. ज्या लोकांची श्वसनसंस्था कमकुवत असते अशा लोकांना श्वास घेणेसुध्दा जड जाऊन त्यांचा जीव व्याकूळ होतो. या सगळ्यांचा विचार करून केवळ मौज म्हणून फटाक्यांवर कमी भर देणेच योग्य आहे.

Saturday, November 10, 2012

चंद्राची गाणी - भाग ४ - इतर गीते

निसर्गातून सगळ्या चांगल्या गोष्टी वेचून घेण्याच्या इच्छेने एक प्रेमिका चंद्रिकेकडे प्रीतीचे वरदान मागते. चंद्राला यावेळी चंद्रिका असे संबोधून ती तिला आपली मैत्रिण बनवते. यासाठी पौर्णिमेचा पूर्ण चंद्र कामाचा नाही, द्वितीयेची नाजुक कौरच हवी.


दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी, रानहरिणी दे गडे भीती तुझी ।।
मोहगंधा पारिजाता रे सख्या, हांसशी कोमेजतां रीती तुझी ।।
रे कळंका छेदितां तुज जीवनी, सुस्वरे जन भारिते गीती तुझी ।।
सोशितोशी झीज कैसी चंदना, अपकारिता उपकार ही नीती तुझी ।।

या गाण्यामधील सर्व उदाहरणे ही त्यागाची आहेत. पारिजाताचे फूल, वेळूचे (बांबूचे) झाड, चंदनाचे खोड हे सर्व स्वतः नष्ट होऊन त्यातून दुस-यांना सुखी करतात. सुरेख दिसणारी चंद्राची कोर आणि भित्री हरिणी यांना त्यांच्या पंक्तीत का बसवले आहे ते कवीवर्य राजा बढेच जाणोत. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांच्या दीदी लताताई यांनी जनसंमोहिनी रागामधील मधुर सुरावटीतून श्रोत्यांवर अजब मोहिनी घातली आहे.


पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राची उपमा सुंदर चेहे-याला नेहमी दिली जातेच तर द्वितीया आणि तृतीयेची चंद्रिका अत्यंत आकर्षक असते. अंगाने थोड्या भरलेल्या चवतीच्या चंद्रकोरीचा सुध्दा केवढा झोक?

कशी झोकांत चालली कोळ्याची पोर ?
जशी चवतीच्या चंद्राची कोर ।।

फेसाळ दर्याचं पाणी खारं ।
पिसाट पिऊनी तुफान वारं ।
उरात हिरव्या भरलं हो सारं ।
भरतीच्या ज्वानीला त्याहून जोर ।।१।।

टाकून टाकशील किती रं जाळी ?
मेघाची सावली कुणाला घावली ?
वा-यानं अजूनी पाठ नाही शिवली ।
वाटेला बांग दिली हिच्यासमोर ।।२।।

केसाची खूणगाठ चाचपून पाहिली ।
फुलांची वेणी नख-यानं माळली ।
कुणाला ठाव रं कुणावर भाळली ।
प्रीतीचा चोर तिला राजाहून थोर ।।३।।

चवतीच्या चंद्रासारखे देखणे रूप मिळालेल्या पोरीने ते अधिक खुलून दिसावे यासाठी थोडा साजश्रुंगार केला कारण राजापेक्षासुध्दा जास्त महत्वाचा असा तिच्या प्रीतीचा चोर तिला भेटणार असावा. कोळ्याच्या देखण्या मुलीचे वर्णन करतांना कविवर्य गदिमांनी ग्रामीण भागातील जीवनाचे सुंदर दर्शन या गीतात घडवले आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमधील चित्रपटांना मधुर संगीत देऊन ज्यांनी अमर केले असा वसंत देसाई यांनी बांधलेल्या स्वररचनेला आपल्या गोड आवाजातल्या ठसक्याने आशा भोसले यांनी अधिकच बहार आणली आहे.


प्रेम, सौंदर्य वगैरे दर्शवणारी चन्द्राची इतकी रूपे पाहिली. आता थोडी वेगळी रूपे पाहू. यमुनेच्या पलीकडे रहाणा-या कुब्जेला पहाटेच्या वेळी श्रीकृष्ण भेटायला गेला त्या प्रसंगाचे वर्णन करतांना कवयित्री इंदिरा संत म्हणतात,

अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ ।
अशा अवेळी पैलतीरावर, आज घुमे का पांवा मंजुळ ।।

मावळतीवर चंद्र केशरी, पहाटवारा भंवती भणभण ।
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती, तिथेच टाकुन अपुले तनमन ।।

विश्वचि अवघे ओठा लावुन, कुब्जा प्याली तो मुरलीरव ।
डोळ्यामधले थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव ।।

अशा अवेळी पैलतीरावर आज घुमे कां पांवा मंजुळ ।
अजून नाही जागी राधा अजून नाही जागे गोकुळ ।।

एरवी नुकताच उगवलेला 'चंद्र पुनवेचा' नेहमी कौतुकाचा असतो, पण मधुर गळ्याची गायिका सुमन कल्याणपूर आणि संगीतकार दशरथ पुजारी या द्वयीने दिलेल्या या भावगीतात मावळतीवर आलेल्या केशरी चंद्राच्या उल्लेखाने पहाटेची वेळ दाखवली आहे.
संत जनाबाई विठ्ठलाची इतकी लाडकी होती की तिला घरकामात मदत करण्यासाठी तो स्वतः तिच्या घरात येत असे. गीतकार शांताबाई जोशी यांनी लिहिलेल्या एका जुन्या गाण्याची चाल एका काळातले भावगीतांचे सम्राट गजानन वाटवे यांनी बांधली होती आणि माणिक वर्मा यांनी ते गयिले होते. जनाबाईची श्रध्दा पाहून तिचा कामाचा भार हलका करण्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग तिला दळण दळायला मदत करतो तेंव्हा ती हर्षभरित होऊन म्हणते,

आभाळीचा चांद माझ्या आज अंगणात ।
पंढरीचा रावा दळी जनीच्या घरात ।।
किती करी काम देवा, घेई रे विसावा ।

हेच ऐक एवढे रे, मान किती घ्यावा ।
घनश्याम विठ्ठला रे, पंढरीच्या राया ।
धावुनिया भक्तांपाठी, वृथा शिणवाया ।
जरा थांबू दे रे देवा, कोमल दे हात ।।

किती माझ्यासंगे, गाउनिया गाणी ।
भागलीस आता, तू रे चक्रपाणी ।
कटी पितांबर शोभे, तळा वैजयंतीमाळा ।
असा हरी गरीबांच्या, झोपडीत झोपी गेला ।
सावळीच गोजिरी ही, मूर्ती सदा नयनात ।।


सूर्य आणि चंद्र पृथ्वीवर प्रकाशकिरणांचा वर्षाव करतात. त्या उजेडात उजळून निघालेल्या पृथ्वीकडे आकाशातले देवच सूर्य व चंद्र या डोळ्यांनी पहात असतात अशी कल्पना आहे. मृत्यू पावलेले जीव स्वर्गात म्हणजे देवलोकात गेल्यानंतर ते सुध्दा असेच पहात असतील अशी कल्पना कवी पी. सावळा राम यांनी केली आहे. आपल्या लाडक्या कन्येचे आयुष्य सुखात जावे, तिला कशाची ददात पडू नये यासाठी तिला चांगले शिक्षण, कला कौशल्य वगैरेंमध्ये निपुण करून एका त-हेने तिच्यासाठी कल्पवृक्ष लावून गेलेल्या बाबांची आठवण काढून त्यांची यशस्विनी झालेली लाडकी लेक म्हणते,

सूर्य चंद्र तुमचे डोळे, दुरूनीच हो बघतात ।
कमी नाही आता कांही, कृपादृष्टीची बरसात ।
पांच बोटे अमृताची, पंचप्राण तुमचे त्यात ।
पाठीवरी फिरवा हात, या हो बाबा एकच वेळा ।।

या गाण्यातले भाव लता मंगेशकरांच्या व्यक्तीगत आयुष्यालासुध्दा लागू पडत असल्यामुळे त्यांनी अत्यंत समरसतेने गाऊन हे गीत अजरामर केले आहे. संगीतकार वसंत प्रभू यांनी या गीताला दिलेली चालही अप्रतिम अशी आहेच.

पी.सावळाराम, वसंत प्रभू आणि लतादीदी यांनी जी अप्रतिम गीते मराठी रसिकांना दिली आहेत त्यातलेच दुसरे एक गीत आहे.
श्रीरामा, घनश्यामा, बघशिल कधी तू रे, तुझी लवांकुश बाळे ।

वनवासाच्या घरात माझ्या, अरुण चंद्र हे सवे जन्मता ।
विरह प्रीतीचे दुःखही माझे, हंसते रघुनाथा ।
विश्वाची मी मंगल माता, तुझी लाडकी सीता ।
तुझ्याविना रे आनंदाला गालबोट लागले ।।

'चंदा है तू मेरा सूरज है तू' अशा शब्दात सगळ्या माता आपल्या मुलांचे कोतुक करत असतात. सूर्य आणि चंद्र ही तेज आणि सौंदर्य यांची प्रतीके आहेत. वाल्मिकी मुनींच्या आश्रमात आपल्या मुलांना वाढवत असतांना सीतामाई वर दिलेले गाणे म्हणते अशी कल्पना आहे.

पुण्यवान लोक मरणानंतर स्वर्गाला जातात. तेंव्हा चंद्र तारे यासारखे आकाशस्थ देव त्यांचे स्वागत करतात. देशकार्यासाठी धारातीर्थी पडलेल्या मुलाचा पिता आपला शोक आवरून म्हणतो,

पोचशी तू दिव्यलोकी सूर्यमंडळ भेदुनी ।
चंद्र तारे धन्य तुजला आरती ओवाळुनी ।

गौरवाचा ग्रंथ लाभे जीवनी तव भारता ।।
झुंजता रणभूवरी तू, अमर होशी रे सुता ।
भाग्य माझे थोर म्हणुनी जाहलो तव मी पिता ।।


सूर्य हा सर्वात जास्त प्रकाशमान आहेच, चंद्र हा त्याच्या खालोखाल तेजस्वी दिसतो. पण हे दोघेही साध्या डोळ्यांना दिसणारा प्रकाश देऊन अंधःकार दूर करतात. सद्गुरूच्या कृपेने मन उजळून निघते. ज्ञानाचा हा प्रकाश इतका प्रखर असतो की तो सूर्यचंद्रांनासुध्दा लाजवतो. ओंकारस्वरूप समर्थ सद्गुरूंना नमन करतांना संत एकनाथ म्हणतात,

गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश, त्यापुढे उदास चंद्र रवि ।
रवि, शशि, अग्नि, नेणति ज्या रूपा, स्वयंप्रकाशरूपा नेणे वेद ।।
ओंकारस्वरूपा सद्गुरूसमर्था, अनाथांच्या नाथा तुज नमो ।।


विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेले संत गोरा कुंभार आळवणी करतात,

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर ।
चंद्र व्हा हो पांडुरंगा, नम करा थोर ।।
बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले ।
वृध्दपणी देवा आता, दिसे पैलतीर ।।

जन्म मरण नको आता, नको येरझार ।
नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार ।।
चराचरापार न्याहो लागला उशीर ।
पांडुरंग पांडुरंग मन करा थोर ।।

गीतकार अशोकजी परांजपे यांनी लिहिलेल्या या नाट्यगीताला संगीतकार जितेंद्र अभिषेकी यांनी दिलेली चाल इतकी सुरेख आहे की गायनाच्या अनेक मैफलींची सांगता या भैरवीने केली जाते.



ज्ञानेश्वरी ग्रंथाचे शेवटी पसायदान मागतांना संत ज्ञानदेव विनंति करतात,

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वाही सदा सज्जन । सोयरे होतु ।।

जगातल्या सर्व लोकांचे प्रत्यक्ष सूर्य चंद्राबरोबर नाते जुळावे, ते सुध्दा काळिमा नसलेला चंद्र आणि दाहक नसलेला सूर्य यांच्याबरोबर, असे मागणे त्यांनी केले आहे. सर्व लोकांनी सज्जन आणि तेजस्वी व्हावे पण त्याबरोबर निष्कलंक रहावे आणि तापदायक होऊ नये असा संदेश या पसायदानांमध्ये दिलेला आहे.



 . . . . .  . . (समाप्त)

Tuesday, November 06, 2012

चंद्राची गाणी - भाग ३ - विरहगीते

चंद्र आणि प्रेम यांच्यात किती जवळचा संबंध आहे हे मागील भागात दिलेल्या गीतांवरून पाहिलेच आहे. चंद्राच्या आभाळातल्या अस्तित्वानेच जशा समुद्रात लाटा उठतात तशाच प्रेमिकांच्या मनातही उठतात. ते एकमेकांच्या सहवासात असतील तर त्यांच्या मनातल्या भावनांचा आवेग जास्तच वाढतो. पण असे चांदण्या रात्रीच्या धुंदीमध्ये एकत्र येऊन न्हाऊन निघणे सर्वच प्रेमिकांच्या नशीबात नसते. त्यातले अनेक दुर्दैवी जीव विरहव्यथा भोगत असतात. त्यातलीच कुणी आर्जवे करते (किंवा करतो) की या पौर्णिमेच्या रात्री एकदा तरी येऊन मला भेटून जा, कधीपासून माझ्या मनात साठून राहिलेल्या मृदु भावना इतक्या प्रबळ आहेत की त्या वाळवंटातही फुलबाग फुलवतील, अंधालाही दिसतील आणि सुखवतील. गीतकार शांताराम नांदगावकर यांनी रचलेल्या या गीतामधील भावना कवीमनाच्या संगीतकार यशवंत देव यांनी अचूक ओळखून सुमन कल्याणपूर यांच्या मधुर आवाजातून रसिक श्रोत्यांपर्यंत या गाण्यातून पोचवल्या आहेत. या गाण्यात विरहव्यथेपेक्षा आर्जव आणि आशा यांना जास्त महत्व आहे.



रात्र आहे पौर्णिमेची, तू जरा येऊन जा ।
जाणिवा थकल्या जिवांच्या एकदा ऐकून जा ।।

निथळला तो भाव सारा वितळल्या चंद्रातुनी ।
मिसळल्या मृदु भावनाही झोपल्या पानांतुनी ।
जागती नेत्रांतली ही पाखरे पाहून जा ।।१।।

पाखरे पाहून जा, जी वाढली पंखाविना ।
सूर कंठातील त्यांच्या जाहला आता जुना ।
त्या पुराण्या गीतिकेचा अर्थ तू ऐकून जा ।।२।।

अर्थ तू ऐकून जा, फुलवील जो वैराणही ।
रंग तो पाहून जा, जो तोषवी अंधासही ।
ओंजळीच्या पाकळ्यांचा स्पर्श तू घेऊन जा ।।३।।


उंबरठा या चित्रपटात एका महिलासुधारगृहात रहात असलेली एक मदनिका तिथल्या नीरस वातावरणात अस्वस्थ होत असते. तेथे यायच्या आधी ती पुरुषांच्या सहवासाला चटावलेली असते. चांदण्या रात्री त्या कामिनीला हा मदनावेग अनावर झाला आहे. तिच्याच शब्दात सांगायचे तर,

चांद मातला मातला, त्याला कशी आवरू ?
अंगी वणवा चेतला, मला कशी सांवरू ?

अशी पुनवेची निशा, चढे चांदण्याची नशा,
गेल्या हरवून दिशा, झाले खुळे पाखरू ।।

आला समुद्र ही रंगा, त्याचा धिटाईचा दंगा,
वेड्या लहरींचा पिंगा, बाई झाला की सुरू ।।

गोड गारव्याचा वारा, देह थरारला सारा,
लाख चुंबनांचा मारा, चांद लागला करू ।।

याची प्रेमपिशी दिठी, लावी चंदनाची उटी,
झाली अनावर मिठी, कुठे धीर मी धरू ?

चांद अंगणी गगनी, चांद नांदतो भुवनी,
चांद अमृताचा मनी, बाई लागला झरू ।।

कवी वसंत बापट, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या सर्व सोज्ज्वळ स्वभावाच्या कलाकारांनी मिळून हे वेगळ्या प्रकारचे अप्रतिम गीत आपल्याला दिले आहे.
आधा है चंद्रमा रात आधी, रह न जाये तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी हे हिंदी गाणे एके काळी खूप गाजले होते आणि अजून सर्वांच्या स्मरणात राहिले आहे. अशाच अर्थाचे एक मराठी गीत कवी मधुकर जोशी यांनी लिहिले आणि कवीमनाचे संगीतकार यशवंत देव यांनी कृष्णा कल्ले या गुणी गायिकेकडून गाऊन घेतले.

कुणा जोडप्याची भेट झाली आहे पण अर्धेमुर्धे बोलणे होईपर्यंत पुन्हा त्यांच्या विरहाचा क्षण आला आहे. त्यांची व्यथा ते सांगतात,

चंद्र अर्धा राहिला, रात्र अर्धी राहिली,
भेट अर्धी, गीत अर्धे, प्रीत अर्धी राहिली ।।

मोकळे बोलू कसे मी, शब्द ओठी थांबले,
लाज-या डोळ्यात माझ्या चित्र अर्धे रेखिले,
ओठ अर्धे विलगले, अर्ध उकले पाकळी ।।

बिलगुनी रमल्या तरूंशी पेंगलेल्या साउल्या,
तो निळा एकांत तेथे भावना भारावल्या,
धुंद झाल्या दशदिशा, रात्रही ओलावली ।।

वाकले आकाश खाली दूरच्या क्षितिजावरी,
चांदणे चुंबीत वारा झोपला वेलीवरी,
भेट घ्याया सृष्टि ही अर्ध झुकली, वाकली ।।


कधी कधी असे होते की प्रियकर आपल्या प्रियेला भेटलेला आहे, पण तो बिचारा इतका थकलेला भागलेला असतो की ती जवळ असतांनासुध्दा तो चक्क झोपून जातो, चांदण्या रात्रीचा आनंद पूर्णपणे उपभोगण्याचं त्राणच त्याच्यात नसतं. या अवस्थेत वियोग नसतांनासुध्दा तिचे मन विरहावस्थेच्या जवळ असते. तेंव्हा अतृप्तावस्थेतील ती म्हणते,

तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास कां रे?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे?

अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला ।
अजुन मी विझले कुठे रे? हाय ! तू विझलास का रे?

सांग, ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे, आणि तू मिटलास का रे?

बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा ।
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे?

उसळती हुदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा ।
तू किनार्‍यासारखा पण कोरडा उरलास का रे?

कवीवर्य स्व. सुरेश भट त्यांच्या कवितांमधून आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात. त्यातली मध्यवर्ती कल्पनाच अफलातून असते आणि त्यातून हवे तेवढे निरनिराळे अर्थ काढता येतील अशी गूढ पण कुशल शब्दरचना असते. वर वर दिसणा-या अर्थाहून वेगळा आणि अधिक भेदक अर्थ त्यात दडलेला आहे असे कोणा विद्वानाने सांगितले होते. अकाली निधन पावलेल्या पतीच्या पत्नीचा आकांत त्याला त्यात दिसला. कोणाला यात पुरुष आणि प्रकृती किंवा जीव आणि आत्मा यांची अवेळी झालेली ताटातूट सापडली.

संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर सुरेश भटांचे चांगले मित्र होतेच आणि त्यांच्या कवितांचा अर्थ समजून घेऊन त्याला तितकीच अफलातून चाल लावत असत. या गाण्यातला भाव पाहता त्यांनी हे गाणे आशा भोसले यांच्याकडून गाऊन घेतले आणि या दोघांनी मिळून या गाण्यात किती आर्ततेचे भाव आणले आहेत याला तोड नाही.


मधुचंद्र चित्रपटातल्या बिचा-या नायक नायिकांचे नशीबच विचित्र असते. त्या दोघांना त्यांच्या लग्नानंतर मधुचंद्राची रात्रसुध्दा तुरुंगवासामध्ये वेगवेगळी घालवावी लागते. बिच्चारे म्हणतात,

मधू इथे अन चंद्र तिथे, झुरतो अंधारात, अजब ही मधुचंद्राची रात।
एक चंद्र अन् अगणित तारे, दो हृदयांवर किती पहारे?
हवी झोपडी, मिळे कोठडी, सरकारी खर्चात, अजब ही मधुचंद्राची रात।।

माहेराला सोडुन फसले, नशिबी आले सासर असले ।
ताटातुटीने सुरेख झाली, संसारा सुरवात ।
अजब ही मधुचंद्राची रात ।।

किती पाहुणे किती निमंत्रित, जमले सारे एका पंक्‍तीत ।
अशी निघाली लग्‍नानंतर, वार्‍यावरची वरात ।
वार्‍यावरची वरात, अजब ही मधुचंद्राची रात ।।

अशा बिकट पण विनोदी प्रसंगाला साजेसे गीत ग. दि. माडगूळकर यांनी लिहिले. संगीतकार एन्‌. दत्ता हे मुख्यतः हिंदी चित्रपटांना संगीत देत असत. त्यातले काही खूप गाजलेही होते. या मराठी चित्रपटासाठी हे द्वंद गीत आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायिले.

वरील गाण्यातला चंद्र दोघांना उदासच बनवतो. तरुण आहे या गाण्यात त्याची जादू पुरेशी ठरत नाही, तशीच प्रेमाचा भर ओसरून गेला किंवा काही कारणाने त्यांच्यात कटुता आली तरी होते. काही जोडप्यांच्या बाबतीत असं होतं की प्रेमाचा पहिला बहर ओसरून गेल्यावर वास्तवाचे कांटेकुटे बोचू लागतात आणि व्यथित अंतःकरणाने तो म्हणतो,

तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी,
एकांती मजसमीप तीच तूही कामिनी ।।

नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे ।
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे ।
जाईचा कुंज तोच, तीच गंधमोहिनी ।।

सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे ?
मी ही तोच तीच तू ही, प्रीति आज ती कुठे ?
ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी ।।

त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा ।
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा ।
गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी ।।

कवयित्री शान्‍ताबाई शेळके आणि संगीतकार व गायक सुधीर फडके यांचे हे गीत म्हणजे भावगीतांच्या क्षेत्रातला एक मैलाचा दगड ठरले किंवा ते त्यातले एक उत्तुंग असे शिखर आहे असेही म्हणता येईल.
प्रत्येकाचे प्रेम सफल होतेच असे नाही. त्यात अनेक अडचणी येतात. काही वेळा त्यातून मार्ग काढणे अशक्यच असते. अशा अपरिहार्य अशा प्राप्त परिस्थितीपुढे नमते घेऊन कुणाकुणाला प्रेम वगैरे विसरून जावेच लागते. अशी एक अभागिनी म्हणते,

चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा ।
मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा ।।

आणिले धागे तुझे तू मीहि माझे आणिले ।
गुंफिला जो गोफ त्याचा पीळ तू विसरून जा ।।

मी दिली वचने तुला अन्‌ वाहिल्या शपथा खुळ्या ।
शब्द केवळ ते तयांचा अर्थ तू विसरून जा ।।

प्रीतिचे हितगूज ते, कुजबुज ती, रुसवेहि ते ।
ते हसू अन्‌ आंसवे ती, आज तू विसरून जा ।।

चंद्र ज्याला साक्ष होता, जे फुलांनी पाहिले ।
रेखिले प्राणांत जे मी तेच तू विसरुन जा ।।

कवयित्री शान्‍ता शेळके यांच्याच या गाण्यातला चंद्र साक्षीला होता, पण तो कसली मदत करू शकणार ? वसंत पवार यांनी रचलेल्या चालीवर माणिक वर्मा यांनी ही काकुळतीची विनंती किती प्रभावीपणे केली आहे ?



चंद्र किंवा चांदणे यांचा ओझरता उल्लेख तर अनेक गीतांमध्ये येतो. कुणाच्या मनात पूर्वीच्या गोड आठवणी येतात. त्या आपल्या येतात आणि जातात आणि कधी कधी ते क्षण पुन्हा अनुभवायची आशाही त्यांना चंद्र दाखवतो.

चंद्र कोवळा पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला,
जरा लाजुनी, जाय उजळुनी, काळोखाच्या राती,
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती ।।

किंवा

अजून फिक्कट चंद्राखाली, माझी आशा तरळत आहे,
गीतामध्ये गरळ झोकुनी अजून वारा बरळत आहे ।।
अजून त्या झुडुपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते ।
अजून अपुल्या आठवणींनी शेवंती लजवंती होते ।।







(क्रमशः)