Tuesday, June 18, 2024

देवांचे अवतार आणि चमत्कृति

 यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ 

परित्राणाय साधूनां विनाशायच च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ 

असे भगवंतांनी गीतेत सांगितले आहे. "जेव्हां जेव्हां धर्माला ग्लानि येऊन अधर्म बोकाळतो तेव्हां तेव्हां तो अधर्म आचरणाऱ्या दुष्टांचा नाश करून आणि धर्म आचरणाऱ्या सज्जनांचे रक्षण करून अधर्माचा नाश व धर्माचे पुनःप्रस्थापन करण्यासाठी मी (परमेश्वर) युगानुयुगे वारंवार अवतार धारण करतो" असा त्याचा अर्थ आहे. पण चराचरात भरून राहिलेला विश्वंभर असा परमेश्वर तर अनादि अनंत आहे, तो सदासर्वकाळ सगळीकडे भरलेला असतोच, मग त्याने वेगळे अवतार घेण्याला काय अर्थ आहे? असा प्रश्नही पडतो. सर्वसामान्य बुद्धीमत्ता आणि आकलनशक्ती असलेल्या लोकांना निर्गुण निराकार परब्रह्म समजणे फार कठीण किंवा जवळ जवळ अशक्य असते. गरज पडते तेंव्हा हा देव अवतार घेऊन प्रगट होतो आणि ठराविक काम करून पुन्हा अदृष्य होतो असे समजणे त्या मानाने सोपे असते. गीता सांगितली किंवा लिहिली गेली त्या काळात आतासारखे हिंदू, ख्रिश्चन, इस्लाम अशा नावांचे निरनिराळे धर्म नव्हतेच, त्यामुळे धर्म या संस्कृत शब्दाचा मूळ अर्थ नीतीमत्ता किंवा सर्वांनी योग्य प्रकाराने वागणे असा घेता येईल. सगळ्या समाजाची नीतीमत्ता रसातळाला जाते आणि समाज अधोगतीला लागतो तेंव्हा कुठल्या ना कुठल्या रूपाने देव अवतरतो आणि समाजाला पुन्हा रुळावर आणतो असा विश्वास माणसाला नकारात्मक विचारातून तग धरून राहण्याचा धीर देतो.

पुराणांमध्ये सांगितलेल्या निरनिराळ्या देवांच्या अवतारांच्या अनेक सुरस कथा पुराणिकबुवा आणि कीर्तनकारांनी रंगवून जनतेपर्यंत पोचवल्या आहेत. बहुतेक कथांची सर्वसाधारण गोष्ट अशी असते की एखादा दुष्टबुद्धि असुर खूप कठोर तपश्चर्या करतो, त्यावर प्रसन्न होऊन एक देव त्याला एक अद्भुत असा वर देतो, त्या वरामुळे त्या दानवाचे सामर्थ्य अचाट वाढल्याने तो सगळे जग जिंकून आपली मनमानी सुरू करतो. देवांनासुद्धा एकदा दिलेला वर परत घेता येत नाही, त्यामुळे सगळे देव, ऋषीमुनी वगैरे कोणा मोठ्या देवाकडे जातात आणि तो महान देव किंवा ती देवी प्रगट होऊन त्या राक्षसाचा संहार करते. यात कुठे शंकर (महादेव) हा सर्व देवांचा देव असतो, कुठे गणेश तर कुठे भगवान विष्णू . काहीवेळा  सगळ्या देवांची शक्ती असलेली आदिशक्ती दुर्गा, काली, चामुंडा अशा रूपामध्ये प्रगट होऊन त्या राक्षसाचा नायनाट करते. असुराला मिळालेले वरदान आणि त्याचा विनाश करण्याची पद्धत अशा तपशीलामध्ये थोडा थोडा फरक असतो, पण मुख्य कथानक लहानसे आणि सोपे असते. सत्याचा असत्यावर किंवा चांगल्याचा वाइटावर विजय होणारच अशा अर्थाचे असते.  अशा  बहुतेक अवतारांमधले देव युद्ध करण्यापुरते प्रगट होतात आणि काम झाल्यावर लगेच अदृष्य होतात. त्यांच्या बाबतीत जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य, देहावसान अशा अवस्था येत नसतात. 

  पण श्रीराम आणि श्रीकृष्ण या महाविष्णूच्या दोन अवतारांची विस्तृत चरित्रे मोठ्या महाकाव्यांमधून रंगवली आहेत. यातली कथानके या अवतारांच्या जन्माच्याही आधीपासून सुरू होतात आणि त्यांचे बालपण, तारुण्य, प्रौढावस्थांमधले अनेक प्रसंग त्यात तपशीलवार दाखवले आहेत. अर्थातच त्यासाठी इतर अनेक पात्रे त्यांच्या विशिष्ट व्यक्तीरेखांसह या कथानकांमध्ये येतात आणि त्या महाकाव्यांची रंगत वाढवतात. त्या कथानकांना सखोल बनवतात.


भागवतपुराणात भगवंतांच्या चोवीस अवतारांबद्दल लिहिले आहे असे म्हणतात, पण बहुतेक लोकांना फक्त दशावतार या नावाने प्रसिद्ध असलेले दहा अवतार माहीत असतात. उरलेले १४ अवतार बहुधा पुराण सांगणाऱ्या पुराणिकांना आणि कदाचित ते पुराण भक्तिभावाने ऐकणाऱ्या श्रोत्यांनाच माहीत असावेत. पहिल्या मत्स्य अवतारात प्रलय होऊन सगळी जमीन पाण्याखाली जाते तेंव्हा मोठ्या माशाच्या रूपाने आलेले विष्णू भगवान एक मोठी होडी घेऊन जमीनीवरील सकल प्राणिमात्रांना वाचवतात, तर दुसऱ्या कूर्मावतारात ते मंदार पर्वताला आपल्या पाठीवर आधार देऊन देवदानवांचे  समुद्रमंथन शक्य करून देतात. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपु नावाचे दोन दैत्य जगाला फार त्रास देत असतात म्हणून वराह आणि नरसिंह असे दोन अवतार घेऊन त्या राक्षसांचा वध करतात. बळीराजा दानव असला तरी धार्मिक वृत्तीचा आणि देवभक्त असतो, वामन अवतारात गोड बोलून त्याच्याकडून पृथ्वी आणि स्वर्गाचे दान मागून घेतात, पण त्याला चिरंजीवत्व आणि पाताळाचे साम्राज्य देतात.  पित्याच्या आश्रमातली दैवी गुण असलेली कामधेनु गाय सहस्त्रार्जुन हा मुजोर राजा बळजबरीने घेऊन जातो आणि त्याचा मुलगा पित्याला मारतो म्हणून सूडाने पेटलेले परशुराम त्या सर्वांना मारून टाकतात. अशा पहिल्या सहा अवतारांच्या संक्षिप्त कथा आहेत. गौतम बुद्धाला खरोखरच विष्णूचा नववा अवतार मानतात याबद्दल शंका आहे आणि दहावा कल्की अवतार अजून झालेलाच नाही. यातले मत्स्य, कूर्म, वामन आणि बुद्ध हे अवतार हातात शस्त्र धारण करतही नाहीत. बाकीचे अवतार दुष्टांचा नाश करतात.

विष्णूच्या या दहा अवतारांमधल्या नृसिंह आणि परशुरामाची मंदिरे काही थोड्याच ठिकाणी दिसतात, क्वचित कुठे वराहस्वामींची देवळे आहेत, पण मत्स्य, कूर्म, वामन या अवतारांची उपासना केलेली माझ्या पहाण्यात आली नाही. अनेक देवळांमध्ये प्रवेश करताच सुरुवातीलाच जमीनीवर एक दगडाचे कासव ठेवलेले असते, पण कूर्मावतार म्हणून कुणीही त्याला देवत्व दिलेले किंवा त्याची पूजा, अर्चना, प्रार्थना वगैरे करतांना दिसत नाही. बौद्ध धर्माचा प्रसार झाल्यावर जगभर अनेक ठिकाणी बुद्धाचे विहार किंवा देवळे बांधण्यात आली आणि तिथे गौतम बुद्धाच्या सुंदर किंवा भव्य मूर्तीही ठेवण्यात आल्या. पण मुळातच गौतम बुद्धाची शिकवण निरीश्वरवादावर भर देणारी आहे आणि हिंदू धर्मीय या मूर्तींकडे भक्तिभावाने पहात नाहीत.


 श्रीराम आणि श्रीकृष्ण या दोन अवतारांचे मात्र असंख्य भक्त आहेत.  उत्तरेतले संत तुलसीदास आणि महाराष्ट्रातले समर्थ रामदास यांनी श्रीरामाच्या भक्तीचा प्रसार केला, तर सूरदास, मीराबाई, चैतन्य महाप्रभू, नरसी मेहता आदींनी श्रीकृष्णाच्या भक्तीचा. त्यांनी सुरू केलेली भक्तीपरंपरा कित्येक शतके टिकून राहिली आहे आणि देशभऱ पसरली आहे. अलीकडच्या काळात ती वाढत असलेली दिसत आहे. मोठ्या गाजावाजाने अयोध्येत भव्य राममंदिर बांधले जात आहे आणि तिथल्या रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठानाचा सोहळाही देशभर भव्य प्रमाणावर साजरा केला गेला. इस्कॉन नावाच्या आंतरराष्ट्रीय संस्थेने जगभरात अनेक ठिकाणी श्रीकृष्णाची वैशिष्ट्यपूर्ण देवळे बांधली आहेत आणि ती पहायलाच पर्यटकांची गर्दी होत असते. 

विठ्ठल आणि व्यंकटेश या दशावतारांमध्ये नसलेल्या विष्णूच्या दोन रूपांचे कोट्यावधी भक्त आहेत. त्यांची सविस्तर चरित्रे नाहीत, पण त्यांच्या महात्म्याच्या अनेक कथा किंवा गाथा आहेत. यातला पंढरपूरचा विठोबा दोन्ही हात कंबरेवर ठेऊन स्वस्थ उभा आहे, त्याच्याकडे कुठलेही शस्त्र नाही. तो कुठल्या भक्तासाठी दळण दळतो, कुणाची गुरे राखतो, कुणासाठी चंदन उगाळतो अशी आपल्या भक्तांची चाकरी करतो, तसेच त्यांच्यावर संकट आले तर त्यांना त्यामधून सुखरूपपणे वाचवतो अशा अनेक कथा आहेत आणि भाविकांची त्यावर गाढ श्रद्धा आहे, पण त्या कथांमध्येसुद्धा विठोबाने कुठल्याही प्रकारची हिंसा केलेली दिसत नाही. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम यासारख्या अनेक संतमंडळींनी रचलेल्या अभंगांमधून विठ्ठलाविषयी अपार भक्ती प्रस्तुत केली आणि कित्येक शतके उलटून गेली तरी आजही हे अभंग भक्तिभावाने गायिले जातात. त्या संतांनी सुरू केलेली वारकरी परंपरा कित्येक शतके टिकून राहिली आहे. आजसुद्धा आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपूरला भरणाऱ्या यात्रेला लक्षावधी भाविक नेमाने नाचत गात जातात. महाराष्ट्रामध्ये रामकृष्णांपेक्षासुद्धा विठ्ठलाची जास्त देवळे आहेत आणि जास्त भक्त आहेत. विठ्ठल हा विष्णूचा नववा अवतार आहे असेही काही लोक मानतात.


आंध्रप्रदेशातील तिरुपति तिरुमल देवस्थानात श्रीव्यंकटेशाचे सुंदर मंदिर आहे. या देवाला उत्तर भारतात बालाजी असे म्हणतात. या तीर्थक्षेत्रात दर्शनाला येणाऱ्या भक्तांची नेहमीच प्रचंड गर्दी असते आणि हे भक्त तिथल्या हुंड्यांमध्ये इतकी दक्षिणा टाकतात की हे मंदिर भारतातले सर्वाधिक श्रीमंत देवस्थान समजले जाते. तिरुपती येथील चतुर्भुज व्यंकटेशाच्या दोन हातांमध्ये चक्र आणि गदा आहेत, पण या अवतारातही त्याने कुणा राक्षसाचे शिर छाटले किंवा दुष्टाचा चेंदामेंदा केला अशा प्रकारची कथा मी ऐकली नाही. व्यंकटेशस्तोत्र हे मराठीतले एक सुंदर स्तोत्र आहे. जुन्या काळात अनेक लोक हे स्तोत्र रोज म्हणत असत. "अन्नासाठी दाही दिशा", "उडदामाजी काळेगोरे" आणि "समर्थागृहीचे श्वान" अशासारख्या या स्तोत्रातल्या ओळी मराठी भाषेत वाक्प्रचार म्हणून वापरल्या जातात. तिरुपतीशिवाय इतर अनेक ठिकाणी श्रीव्यंकटेशाची मंदिरे आहेत. पुण्याजवळ केतकावली इथे बांधलेल्या मंदिराला प्रतितिरुपती असेही म्हंटले जाते. आमच्या जमखंडी गावाजवळ कल्हळ्ली नावाच्या जागी व्यंकोबाचे प्राचीन मंदिर आहे. त्या भागातल्या भक्तांना भेटण्यासाठी तिरुपतीच्या व्यंकटेशाने अवतार घेतला अशी मान्यता आहे.

ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिकुटाने एकत्र येऊन ते दत्तात्रेय या नावाने अवतीर्ण झाले. त्याच्या जन्माची सुरस कथा आहे, पण त्याच्या पुढील अवतारकार्याबद्दल मला तरी काहीच माहिती नाही. पुढे मध्ययुगाच्या काळात दत्तात्रेयांनी श्रीपादसरस्वति आणि नरसिंहसरस्वती या नावाने अवतार घेतले आणि अनेक भक्तांचा उद्धार केला याच्या कथा गुरुचरित्रात विस्ताराने सांगितल्या आहेत. स्वामी समर्थांनाही त्यांचा अलीकडच्या काळातला अवतार मानले जाते.  या निरनिराळ्या अवतारांच्या सहवासामुळे पावन झालेली पीठापूर, नरसोबाची वाडी,  गाणगापूर आणि अक्कलकोट ही देवस्थानेही प्रसिद्ध आहेत आणि अनेक भक्तजन तिथे दर्शनासाठी जातात.  अनेक लोक दर गुरुवारी घरीच किंवा देवळात जाऊन दत्ताचे भजन करतात. दत्तभक्तीची परंपरा मुख्यतः महाराष्ट्रात असली तरी ती कर्नाटक आणि आंध्रमध्येही काही प्रमाणात आहे. श्रीदत्तात्रेयाचे एक प्रसिद्ध मंदिर गुजराथमधील गिरनार पर्वतावर आहे, तर गाणगापूर कर्नाटकात आणि पीठापूर आंध्रप्रदेशात आहे

 

देवांच्या अद्भुत कृती : पर्वत उचलणे

आपल्या पृथ्वीवरील जमीन सपाट नाही, ती डोंगर, दऱ्या, खोरी आदिंनी भरलेली आहे. टेकड्या, डोंगर, पर्वत हे सगळे भूपृष्ठावरील उंचवटे असतात, तिथले खडक इतर ठिकाणच्या जमीनीपेक्षा उंच वर डोकावत असतात. तरी तेही जमीनीच्या खाली असलेल्या खडकांशी जोडलेलेच असतात. इतकेच काय तर समुद्राच्या खालीसुद्धा खडकच असतात. पृथ्वी तयार होत असतांना तिचे एक खडकांचे बाह्य कवच तयार झाले. त्यातल्या खोलगट भागात पाणी साठत गेले आणि महासागर तयार झाले, त्यांनी पृथ्वीचा सुमारे दोन तृतियांश पृष्ठभाग व्यापला वगैरे गोष्टी आपण भूगोलात शिकलो.  


पण पुराणातल्या काही गोष्टींमध्ये असे लिहिले आहे की कुणा देवाने एक पर्वत उचलून दुसरीकडे नेला किंवा जिथल्या तिथेच परत ठेवला.  त्यामुळे पटावर सोंगटी ठेवावी किंवा पानात भाताची मूद ठेवावी तसे हे डोंगर सुटे असतात असे मला लहानपणी वाटायचे. पुराणकाळात देव आणि दानव किंवा सुर आणि असुर जन्माला आले तेंव्हापासून त्यांचे एकमेकांशी वैर असायचे आणि ते सदैव युद्ध करत असायचे. पण कसे कुणास ठाऊक त्यांनी सर्वांनी मिळून सागराचे मंथन करायचे आणि त्याने दडवून ठेवलेली रत्ने बाहेर काढून वाटून घ्यायची असे ठरवले. त्यांनी मंदार पर्वताला उचलून आणले आणि समुद्रात ठेवले. पण तो बुडू नये म्हणून महाविष्णूंनी कूर्मावतार घेतला आणि त्या पर्वताला आपल्या पाठीवर तोलून धरले अशी कथा आहे. 

पुराणातल्या कथांमध्ये कैलासपर्वताचा उल्लेख अनेक वेळा येतो. ब्रह्माविष्णूमहेश या तीन मुख्य देवांमधल्या महेश किंवा शंकराचे कैलास हे वसतिस्थान आहे. ब्रह्म्याचा ब्रह्मलोक आणि विष्णूचा वैकुंठलोक यांचे पृथ्वीवर कुठे अस्तित्व नाही, पण कैलास नावाचा एक पर्वत हिमालयाच्या पलीकडल्या भागात म्हणजे तिबेटमध्ये आहे आणि चीनच्या ताब्यात आहे. पण काही भाविक किंवा उत्साही लोक चीनकडून परवानगी घेऊन कैलास मानससरोवराची यात्रा करतात. ती खूप कठीण असते असे तिथे जाऊन आलेले लोक सांगतात. आतापर्यंत एव्हरेस्ट या सर्वात उंच शिखरावर हजारो लोक चढून गेले असले तरी कैलासाच्या शिखरावर कोणीच चढून गेलेला नाही असे सांगतात. यात्रेकरू कैलासाच्या फक्त पायथ्यापर्यंत जाऊन परत येतात.


पण पुराणात अशी एक कथा आहे की दहा तोंडे आणि वीस हात असलेल्या रावणाने शंकरपार्वती यांच्यासह कैलास पर्वतालाच उचलून डोक्यावर धरले होते .हा प्रसंग दाखवणारे एक शिल्प वेरूळ इथे आहे. 


रामायणात एक असा प्रसंग आहे. रामरावणयुद्धामध्ये रावणाचा मुलगा इंद्रजिताने लक्ष्मणावर एक शक्ती किंवा अस्त्र टाकले ते लक्ष्मणाच्या वर्मी लागले आणि त्याला मूर्छा आली. त्यामधून  त्याचे प्राण वाचवण्यासाठी संजीवनी नावाच्या वनौषधाची आवश्यकता होती. ते वृक्ष द्रोणागिरी नावाच्या पर्वतावर होते आणि ते ठिकाण युध्दस्थळापासून खूप दूर होते. तिथे जाऊन ते औषध घेऊन येण्याचे काम फक्त हनुमानच करू शकत होता. तो लगेच उड्डाण करून मनोवेगाने त्या पर्वतावर गेला, पण त्याला वनौषधींची माहिती नसल्यामुळे त्यातली संजीवनी कुठली हे समजेना. यात वेळ घालवण्याऐवजी त्याने सरळ तो अख्खा डोंगर उचलला आणि एका हाताच्या तळव्यावर त्याला अलगद धरून तो लंकेला घेऊन गेला.

श्रीकृष्णाचे बालपण गोकुळामध्ये गेले. गायी  पाळायच्या आणि त्यांचे दूध, दही, लोणी वगैरे मथुरेच्या बाजारात नेऊन विकायचे यावर तिथल्या गोपगोपिकांचा चरितार्थ चालत असे. आकाशातल्या इंद्रदेवाच्या कृपेने तो व्यवस्थितपणे चालतो अशी त्यांची श्रद्धा होती आणि इंद्राला प्रसन्न ठेवण्यासाठी ते लोक दरवर्षी इंद्राची पूजा आणि यज्ञयाग वगैरे करत असत. श्रीकृष्णाने लहानपणीच अनेक लीला दाखवून त्या लोकांच्या मनावर छाप पाडलेली होती. त्याने गोकुळवासियांना सांगितले की आपल्या गावाजवळचा गोवर्धन पर्वत  हा आपल्या समृद्धीचे खरे कारण आहे. आपल्या गायी, गुरे या डोंगरावर जाऊन चरतात आणि धष्टपुष्ट होऊन भरपूर दूध देतात. म्हणून आपण या वर्षी इंद्राची पूजा न करता या गोवर्धन पर्वताची पूजा करावी. गोकुळातल्या लोकांनी त्याचा शब्द मानला.


पण त्यामुळे इंद्राला राग आला आणि त्याने ढगांना आज्ञा दिली की गोकुळावर जाऊन अतिवृष्टी करा. त्यामुळे अचानक तिथे मुसळधार पाऊस पडायला लागला आणि तिथले लोक घाबरून श्रीकृष्णाकडे गेले. श्रीकृष्णाने त्यांना अभयदिले आणि गोवर्धन पर्वताला उचलून आपल्या करंगळीवर तोलून धरले. सगळे गोपगोपी आपापली मुलेबाळे आणि गायीवासरे यांना घेऊन त्या गोवर्धन पर्वताच्या छताखाली सुरक्षितपणे उभे राहिले. अशा प्रकारे इंद्रदेवाचे गर्वहरण झाल्यावर त्याने श्रीकृष्णासमोर येऊन क्षमायाचना  केली.  

-------------------------




Sunday, June 09, 2024

एडिसन मेमोरियल पार्क



इंग्रजी भाषेतील डिस्कव्हरी (Discovery) आणि इन्व्हेन्शन (Invention) या दोन शब्दांसाठी मराठी भाषेत शोध हा एकच शब्द नेहमी वापरला जातो. माझे शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाले असल्यामुळे मला आधी शोध हा एकच शब्द माहीत होता. मी त्या काळात ज्या प्रसिद्ध शास्त्रज्ञांची नावे वाचली होती त्यातल्या आर्किमिडीज आणि कोपरनिकस यांनी कदाचित एकेकच शोध लावला होता, तर न्यूटनने दहापंधरा शोध लावले असतील. त्यामुळे थॉमस आल्वा एडिसन नावाच्या माणसाने शंभरावर शोध लावले असे वाचले तेंव्हा मी मनाने त्याला जगातला सर्वात मोठा शास्त्रज्ञ ठरवले होते. पण सगळे लोक त्याला सोडून न्यूटन आणि आइनस्टाइन यांना का महान म्हणतात असा प्रश्न मला पडत होता. पुढे सायन्सचे शिक्षण इंग्लिशमध्ये घेत असतांना मला या दोन प्रकारच्या शोधांचे वेगवेगळे अर्थ समजायला लागले.

डिस्कव्हरी म्हणजे निसर्गाचे नियम, क्रम, पदार्थ किंवा ठिकाण  या आधीपासून अस्तित्वात असलेल्या गोष्टींची  माहिती  नीटपणे समजून घेऊन ती सर्वात आधी व्यवस्थितपणे जगाला सांगणे. जो माणूस हे काम करतो त्याने त्याचा शोध लावला असे सांगितले जाते, उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण, सूर्यमालिका, प्राणवायू  इत्यादींचे शोध निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी लावले. अनेक वेळा याचा विपर्यास करून न्यूटनच्या आधी जगात गुरूत्वाकर्षण नव्हतेच का? अशासारखे खोचक प्रश्न विचारले जातात. कोलंबसाला शास्त्रज्ञ म्हणत नाहीत, पण त्याने अमेरिकेचा शोध लावला होता असे म्हंटले जाते.

इन्व्हेन्शन याचा अर्थ एकादी वेगळी वस्तू सर्वप्रथम तयार करणे, उदाहरणार्थ  रेडिओ, मोटार, विमान इत्यादी. या वस्तू आधी होत्या, त्या कुठे तरी हरवल्या आणि कुणी तरी त्या शोधून काढल्या असे काही झाले नाही. थॉमस आल्वा एडिसनने विजेचा दिवा, ग्रामोफोन, सिनेमा यासारख्या शेकडो नव्या वस्तू तयार केल्या आणि जगाला देऊन माणसाचे जीवन पार बदलून टाकले. तेंव्हा तोसुद्धा महान शास्त्रज्ञ किंवा इंजिनियर होताच, पण इतर शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या निसर्गाच्या नियमांचा कौशल्याने उपयोग करून घेऊन त्याने या वस्तू तयार केल्या. त्याने स्वतः फारशी  डिस्कव्हरी केली नाही, पण तो सर्वश्रेष्ठ इन्हेन्टर होता यात शंका नाही. 

मी अमेरिकेत गेलो असतांना साउथ प्लेनफील्ड या गावात रहात होतो, तिथून जवळ असलेल्या शहराचे नाव एडिसन असे होते. एडिसन या शहराचा काही भाग म्हणजे न्यूजर्सीमधले मिनिइंडिया आहे. तिथे भारतीयांची अनेक दुकाने आणि हॉटेले  आहेत. काही रस्त्यांची नावे सुद्धा भारतीय वाटतात. त्या भागात फिरतांना भारतातल्या सगळ्या भागातली खूप मंडळी  दिसतात, काही त्या भागात राहतात तर इतर अनेक लोक न्यूजर्सीतल्या आजूबाजूच्या भागातून खरेदीसाठी तिथे येत असतात. मीसुद्धा अनेक वेळा त्या भागात जात होतो. पण मला थॉमस आल्वा एडिसनच्या नावाची पाटी तिथे कुठे दिसली नाही. चौकशी करता असे कळले की प्रसिद्ध संशोधक थॉमस आल्वा एडिसन याने पूर्वीच्या रारिटन नावाच्या गावातल्या मेन्लो पार्कमध्ये आपली पहिली प्रयागशाळा उघडली होती. तिला शोधांचा कारखाना (इन्व्हेन्शन फॅक्टरी) असे नाव त्याने दिले होते आणि खरोखरच तो तिथे एकामागोमाग एक अनेक शोध लावत गेला. पण पुढे त्याने आपला मुक्काम दुसऱ्या ठिकाणी हलवला आणि तिथे दहापट मोठी कार्यशाळा बांधली, तसेच राहण्यासाठी मोठा बंगला बांधला. त्याचा मेन्लो पार्कमधला कारखाना काळाच्या ओघात पडझड होऊन नाहीसा झाला, पण १९५४ साली रारिटनमधल्या रहिवाशांनी त्यांच्या गावाचेच नाव बदलून एडिसन असे ठेवले.

थॉमस आल्वा एडिसन जितका मोठा संशोधक होता तितकाच हुषार उद्योगपती होता. त्याने लावलेल्या नव्या शोधांचे तो लगेच पेटंट घेऊन ठेवत होता आणि त्या वस्तू कारखान्यात तयार करून चांगल्या किंमतीला बाजारात विकून त्यातून नफा मिळवत होता. त्याचा उद्योग व्यवसाय वाढल्यानंतर त्याने मेन्लोपार्कमधल्या जागेतून न्यूजर्सीमधल्याच वेस्ट ऑरेंज नावाच्या जागी स्थलांतर केले. मेन्लो पार्कमधला कारखाना पडझड होऊन नष्ट झाला पण  वेस्ट ऑरेंज या ठिकाणी त्याने बांधलेला कारखाना मात्र त्याच्या मृत्यूनंतरही सुव्यवस्थित ठेवला गेला आणि त्याचे रूपांतर थॉमस एडिसन नॅशनल हिस्टॉरिकल पार्कमध्ये केले गेले. एडिसनविषयी मनात खूप कुतूहल आणि आदर असल्यामुळे आम्ही तिथे जाऊन त्या स्मारकाला भेट दिली.


जुन्या काळातल्या आठवणींचे काळजीपूर्वक जतन करून, त्यांना अतिशय व्यवस्थितपणे मांडून त्यांचे आकर्षक असे प्रदर्शन करण्याची कला अमेरिकन लोकांनी फार चांगली विकसित केली आहे. मी मागे एकदा अॅटलांटाचे कोकाकोला म्यूजियम पाहिले होते तेंव्हाही मला याची प्रचीति आली होती. एडिसनचा हा कारखाना कदाचित जवळ जवळ शंभर वर्षांपूर्वीच बंद झाला असेल, आज तर त्यात कुठलेही नवे उत्पादन होतही नाही, तरीही हा संपूर्ण कारखाना एखाद्या वस्तुसंग्रहालयासारखा टिकवून ठेवला आहे. पूर्वीच्या काळातली सगळी यंत्रसामुग्री जिथल्या तिथे मांडून ठेवली आहे, इतकेच नव्हे तर ज्या कच्च्या मालांपासून निरनिराळ्या वस्तूंचे उत्पादन केले जात होते त्यांचे शेकडो नमूनेसुद्धा व्यवस्थित मांडून ठेवले आहेत. 


या हिस्टॉरिकल पार्कची रचना एकाद्या कारखान्यासारखीच आहे. एका तीन मजली इमारतीत मुख्य प्रयोगशाळा, हेवी मशीन शॉप आणि लाइट मशीन शॉप आहे. तीन निरनिराळ्या शेड्समध्ये मेटॅलर्जी लॅब, पॅटर्न शॉप आणि केमिस्ट्री लॅब आहेत. सिनेमा तयार करण्याच्या स्टूडिओची वेगळी शेड आहे. जगातला पहिला चित्रपट कुठे तयार केला गेला ती जागा राखून ठेवली आहे. पर्यटकांचे स्वागत करायच्या इमारतीत एका लहान सभागृहात बसून एडिसनचे जीवन आणि कार्य यावरील चित्रफिती पहाण्याची सोय आहे. दुसऱ्या एका सभागृहात  दर तासातासाला एक माणूस येऊन दहा पंधरा मिनिटांचे मनोरंजक व्याख्यान देतो आणि एडिसनने लावलेले मुख्य शोध प्रात्यक्षिकांसह चांगले समजावून सांगतो.


मुख्य इमारतीत तळमजल्यावर एका कारखान्यात प्रवेश करताच मला आमच्या इंजिनियरिंग कॉलेजमधले वर्कशॉप आठवले. मी साठ वर्षांपूर्वी तिथे शिकायला गेलो होतो तेंव्हा तिथे खूप जुन्या काळातली यंत्रे होती. एडिसन पार्कमधल्या या हॉलमध्येही एका ओळीत तसल्या सात आठ लेथ मांडून ठेवल्या होत्या आणि आठदहा फूट उंचावर आडव्या रेषेत फिरणाऱ्या एका लांबच लांब शाफ्टवरील चाकांना (पुलीजना) ती लेथ मशीन्स पट्ट्यांनी जोडलेली होती. एका टोकाला जोडलेले एक इंजिन किंवा मोटार त्या शाफ्टवरील चक्राला पट्ट्याने जोडले होते आणि ते एकटेच चाक तिथल्या सगळ्या यंत्रांना चालवेल अशी योजना होती. आम्ही गेलो तेंव्हा त्यातले काहीच प्रत्यक्षात चालवले जात नव्हते. पन्नास साठ वर्षांपूर्वीच जगातल्या सगळ्या कारखान्यांमधल्या प्रत्येक यंत्राला स्वतंत्र विजेची मोटर जोडून तिच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचीही सोय केली गेली. त्यामुळे कॉलेजनंतर मी कुठेच असा कॉमन शाफ्ट, पुलीज आणि बेल्ट पाहिले नव्हते, ते पन्नाससाठ वर्षांनी इथे पहायवा मिळाले. लेथ्सच्या बाजूला शेपिंग, मिलिंग, प्लेनिंग वगैरे इतर मशीनेही होती. हे एडिसनचे हेवी मशीन शॉप होते. वरच्या मजल्यावर लाइट मशीन शॉप होते, त्यात अधिक अचूक आणि नाजुक कामे करणारी यंत्रे होती. 


सर्वात वरच्या मजल्यावर प्रयोगशाळा होती, तसेच एडिसनने लावलेल्या विविध शोधांची माहिती दाखवणारे फलक, फोटोग्राफ्स आणि त्या शोधवस्तू मांडून ठेवल्या होत्या. त्याने विजेच्या दिव्याचा शोध लावला, पण पहिला दिवा यशस्वीपणे प्रकाश द्यायला लागला त्याआधी हजार वेळा त्याचे प्रयोग अयशस्वी झाले होते आणि यशस्वी झाल्यानंतर त्याने अनेक निरनिराळ्या आकारांचे दिवे तयार केले होते, त्यातले वीसपंचवीस प्रकार त्या प्रदर्शनात मांडून ठेवले होते. विजेचा दिवा लावायचा असेल तर आधी वीजही असायला पाहिजे. त्यासाठी एडिसनने वीज तयार करणारे जनरेटर तयार केले आणि आपल्या गल्लीत अनेक खांब उभारून त्यावर विजेचे दिवे लावले आणि त्यांना तारांनी जोडून प्रकाशमान केले. ते उदाहरण पाहून लोकांनी आपल्या घरांमध्ये वीज पुरवण्याचा आग्रह केला आणि एडिसनने ते काम केले. यात वाढ होत त्याने संपूर्ण न्यूयॉर्क शहराला वीजपुरवठा करण्याचे कंत्राट घेऊन पूर्ण केले. 


ग्रामोफोन आणि सिनेमा हे एडिसनचे इतर मुख्य शोध आहेत. त्यांचीही समग्र माहिती फलकांमधून प्रदर्शनात मांडली होती. याशिवायही त्याने अनेक लहानमोठे शोध लावले होते. केमिकल आणि मेटॅलर्जी विभागात अनेक निरनिराळी खनिजे, क्षार, धातू वगैरेंवर काम केले होते. त्यातून कित्येक नवे उपयुक्त पदार्थ तयार केले होते. त्याने हजारापेक्षा जास्त पेटंटे घेऊन ठेवली होती. त्यांच्या बाइंडिंग करून ठेवलेल्या पुस्तकांनीच सातआठ कपाटे भरली होती. तळमजल्यावरून वरच्या मजल्यांना जाण्यासाठी एक मेकॅनिकल लिफ्ट बसवली होती, पण तिचा उपयोग फक्त एडिसन स्वतःच करत होता. इतर कुणाला त्यातून जाण्याची परवानगी नव्हती. इतकेच नव्हे तर कामगारांनीसुद्धा आपला मजला सोडून कुठल्याही दुसऱ्या मजल्यावर किंवा आपली इमारत सोडून दुसऱ्या इमारतीत जाण्याला सक्त मनाई होती.


वरच्या मजल्यावरील एका हॉलमध्ये एक खास कार्यक्रम होत असे आणि तो पाहण्यासाठी त्या वेळी हजर असलेले सर्व पर्यटक तिथे जमत असत. एक वयस्क माणूस येऊन एडिसनच्या विविध शोधांची मनोरंजक माहिती देत असे आणि काही प्रात्यक्षिके करून दाखवत असे. यामध्ये ग्रामोफोनचे प्रात्यक्षिक महत्वाचे होते. त्यात एडिसनने तयार केलेला जुना ग्रामोफोन त्याने चालवून वाजवून दाखवला, तसेच त्याचा आवाज कमी अधिक करण्यासाठी काय योजना केली होती ती समजावून सांगितली. नंतरच्या काळात इलेक्ट्रॉनिक्सने हे काम अगदी सोपे केले, एक नॉब फिरवून किंवा बटन दाबून  हवा तेवढा व्हॉल्यूम अॅडजस्ट करणे शक्य झाले, पण अँप्लिफायरचा शोध लागायच्या आधी एडिसनने तयार केलेल्या ग्रामोफोनमध्ये एक लहानशी दांडी हलवून त्याच्या कर्ण्याचा आवाज मोठा किंवा बारीक करायची सोय केली होती हे पाहून आश्चर्य वाटले. 


सिनेमाचे यंत्र हा एडिसनचा आणखी एक क्रांतिकारक शोध होता.  एकापाठोपाठ एक अनेक चित्रे वेगाने पडद्यावर दाखवून  चालत्या बोलत्या चित्रांचा आभास दाखवणे ही कल्पनाच भन्नाट होती. एडिसनने त्यासाठी काय काय करावे लागेल याची योजना करून ती सगळी यंत्रसामुग्री निर्माण केली आणि प्रात्यक्षिके करून दाखवली. त्यासाठी एक वेगळी शेड तयार केली होती ती आजही दाखवला जाते.


एडिसनला प्रयोग करून पाहणे अत्यंत प्रिय होते आणि त्याच्याकडे कमालीची चिकाटी होती. प्रयोग केल्यामुळेच प्रगती होते यावर त्याचा ठाम विश्वास होता आणि मिळालेल्या अपयशाने डगमगून न जाता आपले साध्य गाठेपर्यंत तो असंख्य प्रयोग करत रहात असे. कार्यशाळा हीच त्याची प्रयोगशाळा होती आणि त्याने त्याला शोधांचा कारखाना (इन्व्हेन्शन फॅक्टरी) असे नाव दिले होते. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पहिल्याच प्रयत्नात सहसा पूर्ण यश मिळत नाहीच. पण जे अनपेक्षित परिणाम येतात त्यांची चिकित्सा करून कोणती तृटी राहिली याचे नेमके कारण शोधून काढून आवश्यक ती सुधारणा करून पुढील प्रयोग केले जातात. एडिसनला विज्ञानाची सखोल जाण असल्यामुळेच तो हे काम व्यवस्थितपणे करू शकत होता.


या संग्रहालयाच्या आवारात थॉमस एडिसनचा एक भव्य पुतळा आहे आणि दुसऱ्या एका ठिकाणी एडिसन आणि टेसला या दोघांचे पूर्णाकृति पुतळे जवळ जवळ उभे केले आहेत. अमेरिकेतल्या पद्धतीप्रमाणे कुणीही पर्यटक या पुतळ्यांच्या आजूबाजूला उभे राहून किंवा त्याच्याशी लगट करून आपले फोटो काढून घेऊ शकतो. एडिसनचा समकालीन प्रसिद्ध शास्त्रज्ञ निकोला टेसला हा डिस्कव्हरी आणि इन्व्हेन्शन या दोन्हीही गोष्टी करणारा महान शास्त्रज्ञ होता. विजेच्या उत्पादनाच्या आणि विजेचा उपयोग करून घेण्याच्या बाबतीत तो एडिसनचा प्रतिस्पर्धी होता. त्याने आल्टर्नेटिंग करंट (एसी) या प्रकारच्या विजेचा पुरस्कार केला आणि तिचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि वहन सुरू केले. एडिसनने विजेचे दिवे लावून जगाला अंधारातून प्रकाशात आणले तर टेसलाने विजेवर चालणारी यंत्रसामुग्री तयार करून यांत्रिकीकरणाला चालना दिली. मी नायगराचा धबधबा पहायला गेलो होतो तेंव्हा टेसलाचे स्मारक पाहिले होते आणि या वेळी एडिसनचे स्मारक पाहून या दोन्ही महान शास्त्रज्ञांची किमया पाहिली आणि धन्य झालो.

थॉमस आल्वा एडिसन यांच्या जीवनाबद्दल माहिती 

एडिसन, टॉमस अल्वा (११ फेब्रुवारी,१८४७ ते १८ ऑक्टोबर,१९३१).अमेरिकन संशोधक. तारायंत्र, ग्रामोफोन, प्रदीप्त दिवा (बल्ब), वीज पुरवठ्याचे देशव्यापी जाळे पसरविणारे विद्युत् जनित्र, चलच्चित्रपट प्रक्षेपक (सिनेमा प्रोजेक्टर), प्रत्याभरण (चार्जिंग) करता येणारी विद्युत् संचायक घटमाला (बॅटरी), पहिला बोलका चित्रपट, बेंझीन व कार्बोलिक अम्लाची निर्मिती यांसाठी एडिसन ओळखले जातात.

एडिसन यांचा जन्म अमेरिकेच्या ओहायओ प्रांतातील मिलान या गावी झाला. मिशिगन राज्यातील पोर्ट ह्यूरन येथील शाळेत ते तीन महिनेच शिकले.  बारा वर्षांचे असताना त्यांनी ग्रँड ट्रंक रेल्वेवर वर्तमानपत्र विकताना छपाई यंत्राशी खटपट व प्रयोग करायला सुरुवात केली. वयाच्या १५ व्या वर्षी ग्रँड ट्रंक वीकली हे साप्ताहिक सुरू केले आणि मालगाडीच्या डब्यातच प्रयोगशाळा थाटली. मात्र प्रयोगशाळेत स्फोट झाल्याने त्यांना प्रयोगशाळा बंद करावी लागली. रेल्वे स्टेशन अधिकाऱ्याच्या मदतीने ते तारायंत्र शिकले व तारायंत्र प्रचालक (ऑपरेटर) म्हणून नोकरी करू लागले.  या नोकरीच्या काळातच, त्यांनी त्यांचा महत्त्वाचा प्रचालकाशिवाय चालणाऱ्या, एकच संदेश विविध ठिकाणी पाठवू शकणाऱ्या स्वयंचलित यंत्राचा शोध लावला. त्यानंतर त्यांनी बॉस्टन शहरात नोकरी पत्करली आणि उर्वरित वेळ संशोधनासाठी दिला. तेथे त्यांनी एक मतदान यंत्र तयार केले, या करिता त्यांना १८६८ मध्ये पहिले एकस्व (पेटंट) मिळाले. न्यूयॉर्कमधील ‘गोल्ड अॅण्ड स्टाक’ तारायंत्र कंपनीत काम करत असताना तेथील यंत्रसामग्री व सेवाप्रणालीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्या. नोकरीतून उरलेल्या वेळात संशोधन करताना तारायंत्रासाठी जोडयंत्रणा तयार केली. त्यातूनच मिळालेल्या कमाईतून प्रयोगशाळा स्थापन करून स्वयंचलित वेगवान तारायंत्रणा तयार केली. त्यामुळे नेहमीच्या तारायंत्र तारांद्वारे अनेकपट अधिक संदेशवहनाची सोय झाली. त्याचवेळेस अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी शोधलेल्या टेलिफोनसाठी एडिसनने प्रेषक (ट्रान्समीटर) शोधून एक महत्त्वपूर्ण संशोधन केले.  सन १८७७ मध्ये, एडिसनने फोनोग्राफचा (मूळचा ग्रामोफोन) शोध लावला. यांत्रिक ऊर्जा वापरून प्रथमच कथिलाच्या (टीनच्या) पत्र्यावर आवाज लिहिला गेला आणि ध्वनिमुद्रण नावाचे नवीन विश्व उलगडले गेले.

विजेच्या दिव्याचा शोध जरी जोसेफ स्वॅान यांनी लावला असला, तरी विजेच्या दिव्याला लोकमान्यता मिळण्यासाठी एडिसनने सर्वांना परवडणारा, सहज हाताळता येणारा, टिकाऊ आणि सुरक्षित असा प्रदीप्त दिवा (बल्ब) तर तयार केलाच शिवाय विजपुरवठ्याचे देशव्यापी जाळे उभे केले. विजेच्या दिव्याचे घाऊक उत्पादन आणि वितरण केले.  त्यामुळे सर्वसामान्यांनी विजेच्या दिव्याला आपलेसे केले. याच विजेच्या दिव्यात नवनव्या सुधारणा केल्या. मोठ-मोठी विद्युत् जनित्रे बनविली आणि १८८२ मध्ये जगातला पहिला मध्यवर्ती वीजनिर्मिती प्रकल्प न्यूयॉर्क शहरात स्थापन केला. सन १८८८ मध्येच एडिसन यांनी चलच्चित्रपट प्रक्षेपक (कायनेटोस्कोप) शोधून काढला. यात सुटीसुटी चित्रे भराभर फिरवून हलती चित्रे अर्थात ‘सिनेमा’ निर्माण केला. चलच्चित्रपट प्रक्षेपक म्हणजेच सिनेमा प्रोजेक्टर. यानंतर एडिसनने पुनर्भारण (चार्जिंग) करता येण्याजोगी, लोह व निकेल वापरून अल्कधर्मी संचायक विद्युत् घटमाला (स्टोरेज बॅटरी) तयार केली.  ती भक्कम, टिकाऊ व उच्चक्षमतेची होती.   फोनोग्राफमध्ये सुधारणा करून व चलच्चित्रपट प्रक्षेपकाशी जुळवून पहिला बोलका सिनेमा तयार केला. विजेचे पेन, मिमिओग्राफ (सायक्लोस्टायलींग मशीन), तापमानातील अतिसूक्ष्म बदल दाखविणारा मायक्रोसिमिटर, धावत्या रेल्वेाशी संपर्क साधण्यासाठी बिनतारी  यंत्रणा अशा अनेक संशोधनानंतर एडिसनने रसायन उद्योगातही झेप घेतली. एडिसनने बेंझीन, कार्बोलिक अम्ल यांसारख्या रसायनांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारी संयंत्र उभारून, त्यावर उत्पादन करून पहिल्या महायुद्धाच्या काळात साहाय्य केले. त्याने तापानुशीतन (अनिलींग) प्रक्रियाही शोधून काढली. ही धातू, मिश्रधातू व काच यांचा ठिसूळपणा कमी करणारी प्रक्रिया आहे. विजेवर चालणाऱ्या घरगुती व औद्योगिक यंत्राच्या क्षेत्रातील जगातील सर्वांत मोठी कंपनी ‘जनरल इलेक्ट्रीक’ एडिसननेच स्थापन केली. सन १९१५ मध्ये, अमेरिकन नौदल सल्लागार समितीचा अध्यक्ष असताना एडिसनने नौदलासाठी अनेक उपकरणे तयार केली.

एडिसन यांनी काळानुसार आधी बनविलेल्या उपकरणात अनेक सुधारणा घडवून आणल्या. सन १८८३ मध्ये एडिसन यांनी सूक्ष्म निरिक्षणावर आधारित ‘धातूच्या तप्त राखेतून इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह निघतो’ हा  महत्त्वपूर्ण शोध लावला.  हा शोध आधुनिक इलेक्ट्रॅानिक्स तंत्रज्ञानात मूलभूत आणि महत्त्वाचा ठरला. म्हणूनच या शोधाला ‘एडिसन इफेक्ट’असे नाव दिले गेले. ‘कठोर परिश्रमाला पर्याय नाही’ हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. त्यानुसार त्यांनी अपार कष्ट केले.

एडिसन यांनी विद्युत् क्षेत्र आणि संदेशवहन या क्षेत्रांमध्ये अत्यंत यशस्वी संशोधन केले असले तरी, १८८० ते १८९० च्या दशकात एडिसनने आपल्या प्रयोगशाळेत चुंबकीय खनिज अलग करण्याला प्राधान्य दिले होते.  त्यापूर्वीही प्रदीप्त दिव्यांसाठी प्लॅटिनमचा शोध घेत असताना खनिज विलग करण्यावर एडिसनने काम केले. त्याने वाळुतून लोहमिश्रीत खनिज प्लॅटिनम बाजूला करणारे उपकरण बनविले होते.  एडिसनने १४५ जुन्या खाणींचे स्वामित्व मिळविले होते. त्यातील न्यू जर्सीतील ऑक्डेन येथील खाणीवर एक मोठा पायलट प्लान्ट स्थापीत केला होता. त्यातून त्याला पैसे कमविण्याची संधी दिसत होती.  परंतु जेव्हा लोखंडाचे भाव धडाधड कोसळले तेव्हा त्यांनी ही कल्पना सोडून दिली. कोणतेही अपयश एडिसनच्या संशोधन वृत्तीला थांबवू शकले नाही. आपल्या वयाच्या ८० व्या वर्षीही त्यांचे संशोधन चालूच ठेवले.

आपल्या आयुष्यात एडिसन यांनी विद्युत्दीप आणि शक्ती संबंधी ३८९, फोनोग्राफसंबंधी १९५, टेलिग्राफ संबंधी १५०, संचायक विद्युत् घटमाला (स्टोरेज बॅटरी) संबंधात १४१ आणि दूरध्वनी  संदर्भात ३४ अशी एकूण ९०० च्या वर एकस्वे संपादित केली.

अमेरिकेशिवाय इंग्लंड, फ्रान्स व इतर देशांनी अनेक पुरस्कार, सुवर्णपदके इत्यादी देऊन एडिसन यांचा वेळोवेळी सन्मान केला. जनतेची कृतज्ञतेची पावती म्हणून एडिसनने व्रतस्थ राहून निर्मोही वृत्तीने त्यांचा स्वीकार केला. अनेक पराक्रमांनी आपले आयुष्य सार्थकी लावून एडिसन  न्यू जर्सीतील वेस्ट ऑरेंज येथे निवर्तले. सन १९५५ मध्ये एडिसन यांचे घर व प्रयोगशाळा अमेरिकन सरकारने राष्ट्रीय ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित केले.  मागच्या वर्षी म्हणजे २०२३मध्ये आम्ही या केंद्रालाच भेट दिली आणि त्याच्या निरनिराळ्या कार्यशाळा व प्रयोगशाळा प्रत्यक्ष पाहिल्या,


Saturday, June 01, 2024

अमेरिकेतला भारतीय स्वातंत्र्य दिवस

 आपण सर्वजण दरवर्षी १५ ऑगस्टला मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्यदिन साजरा करत असतो. त्या दिवशी दिल्लीमधल्या लाल किल्ल्याच्या एका बुरुजावर देशाचे पंतप्रधान झेंडावंदन करतात. तो सोहळा पाहण्यासाठी  खालच्या प्रांगणामध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक आणि मुले जमा झालेली असतात. त्यांच्यासमोर प्रधानमंत्री मोठे भाषण करतात, ते खरे तर सर्व देशाला उद्देशून केलेले असते आणि टेलिव्हिजनच्या सर्व वाहिन्या त्याचे थेट प्रक्षेपण करत असल्यामुळे देशभरातले कोट्यावधी लोक ते भाषण भक्तिभावाने ऐकत असतात. आमच्या लहानपणी गावातल्या सगळ्या शाळांमधली मुले त्या दिवशी सकाळी प्रभातफेरी काढून रांगेने गावातल्या मुख्य रस्त्यांवरून फिरून अखेर मामलेदार कचेरीच्या आवारात जमा होत असत आणि तिथे तालुक्याचे मुख्य अधिकारी व नेतेमंडळी झेंडावंदन करून चार शब्द उपदेश करत असत. मोठेपणी आमच्या अणुशक्तीनगर वसाहतीतसुद्धा प्रत्येक बहुमजली बिल्डिंगमधले बहुतेक रहिवासी खाली उतरून सार्वजनिक ध्वजारोहणाचा कार्यक्रम करत असू आणि त्यानंतर देशभक्तिपर गाणी गाऊन मिठाई वाटत असू. 

आता पुण्यातल्या आमच्या ब्ल्यूरिज टाउनशिपमध्येसुद्धा आम्ही ती परंपरा जोपासली आहेच. मध्यंतरी कोविडमुळे दोन वर्षे खंड पडला होता.   गेल्या वर्षी तिथल्या रहिवाशांनी दणकेबाज कार्यक्रम करून  त्याची उणीव भरून काढली. त्या वर्षी मी तिथे हजर नव्हतो तरी वॉट्सॅपवर त्या कार्यक्रमांचे व्हीडिओ आणि फोटो पाहिले.

 गेल्या वर्षी ४ जुलै म्हणजे अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाला मी तिथे होतो. त्या दिवशी सर्वांना सुटी होती पण ती कशी मजेत घालवायची याचाच विचार सगळेजण करत होते. न्यूजर्सीमध्ये आम्ही रहात असलेल्या भागात तरी कुठल्याच प्रकारची मिरवणूक, सभा असा काही प्रकार नव्हताच. संध्याकाळी अंधार पडल्यावर एका ठिकाणी सार्वजनिक फायरवर्कचा कार्यक्रम होता. तो पहायला म्हणून आम्ही मोटारीतून गेलो तर त्या पटांगणाकडे जाणारे सगळे रस्ते दूर दूर अंतरांवरच वाहतुकीसाठी बंद करून ठेवले होते. तो पत्ता देऊन जीपीएसवरून शोध घेतांना आम्ही वळत वळत पाचसहा मैलांचा फेरा घालत आणि पुन्हा पहिल्याच ठिकाणी परत येत होतो. वाटेत एका ठिकाणी काही मंडळी रस्त्याच्या कडेला असलेल्या लहानशा उंच जागेवर उभी असलेली दिसली. तिथे रस्त्यावर हवी तिथे गाडी उभी करता येत नाही. त्यामुळे त्या लोकांच्या पलीकडे मोकळी जागा पाहून दाटीवाटीने तिथे गाडी लावली आणि आम्हीही त्यांच्या घोळक्यात सामील झालो. तेवढ्यात दुरून आकाशात आतीशबाजी सुरू झालेली दिसायला लागली.  एकामागोमाग एक अग्निबाण आकाशात उडून फुटत होते रंगीबेरंगी कण उधळत होते आणि विझून जात होते. आजकाल आपल्याकडे लग्नसमारंभामध्ये करतात तशाच प्रकारची ही रोशणाई होती आणि आम्ही ती खूप दुरून पहात असल्यामुळे फार आकर्षक किंवा डोळे दिपवणारी वाटली नाही. मी यापूर्वी युरोपअमेरिकेत काही ठिकाणी पाहिलेले लेजर शोज यापेक्षा अनेक पटींनी भव्यदिव्य होते.

मागील वर्षी १५ ऑगस्टला मंगळवार होता. त्या दिवशी अमेरिकेत सुटीचा दिवस नव्हता, सगळ्या लोकांना कामावर जायचे होते आणि सगळ्या मुख्य रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थितपणे सुरु ठेवणे आवश्यक असते, त्यात व्यत्यय येऊ द्यायचा नसतो. म्हणून तिथल्या भारतीय रहिवाशांना आधीच्या आणि नंतरच्या रविवारी म्हणजे १३ आणि २० तारखेला स्वातंत्र्यदिवस साजरा करायला परवानगी मिळाली होती. आमच्या साउथ प्लेनफिल्ड गावातून जाणाऱ्या ओकट्री रोडवर पुढे लागणाऱ्या एडिसन या शहराच्या एका भागात पहिल्या रविवारी एक शोभायात्रा काढण्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्या भागात आदल्या दिवसापासूनच रस्त्याच्या दोन्ही कडांना अमेरिकेचे आणि भारताचे राष्ट्रध्वज लावून ठेवले होते ते आम्ही पाहिले होते, पण त्या दिवशी आकस्मिक उद्भवलेल्या काही कारणामुळे आम्ही ती मिरवणूक पहायला जाऊ शकलो नाही.  २० तारखेला न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन या मुख्य भागात एक खूप मोठी शोभायात्रा निघणार होती ती पहायचे ठरवले.

न्यूयॉर्कमधली प्रचंड रहदारी, तिथे पार्किंगसाठी जागा शोधण्याचे दिव्य आणि त्यासाठी भरावा लागणारा अव्वाच्या सव्वा भुर्दंड वगैरेचा विचार करता आम्ही तिथे ट्रेनने जायचे ठरवले. आमच्या घरापासून तीनचार मैलावर असलेल्या मेट्रोपार्क नावाच्या रेल्वे स्टेशनवर गेलो, तिथल्या प्रशस्त पार्किंग लॉटमध्ये गाडी उभी केली आणि तिकीटे काढून प्लॅटफॉर्मवर गेलो. इथली रेल्वेस्टेशने सपाट जमीनीवर एका लेव्हलला नसतात. तिथे जाऊन पोचल्यावरसुद्धा एलेव्हेटर (लिफ्ट) किंवा सरकत्या जिन्यांमधून वरखाली जावे लागते. आम्हाला ते शोधून प्लॅटफॉर्मवर जाऊन पोचायला जरा जास्तच वेळ लागला आणि आमची गाडी आमच्या डोळ्यासमोरून धडधडत जातांना दिसली. आता पुढची ट्रेन येईपर्यंत वाट पहात बसणे भाग होते. पण बसायला चांगल्या खुर्च्या होत्या आणि त्या सगळ्या रिकाम्याच होत्या. आम्ही एका जागी बसलो, बरोबर आणलेले डबे उघडले आणि सँडविचेस खाऊन घेतले. 

आमच्या समोरच फक्त दोन तीन डब्यांची एक लहानशी ट्रेन येऊन उभी राहिली. माइकवर दिल्या जात असलेल्या घोषणांनुसार ती गाडीसुद्धा न्यूयॉर्ककडे जात होती. आम्ही उठून तिकडे जात होतो तेवढ्यात पुढच्या डब्यातून एक टीसीसारखा गणवेशधारी ऑफिसर उतरला आणि त्याने ही गाडी अमक्या तमक्या कंपनीची आहे, ज्यांनी आमच्या कंपनीचे तिकीट काढले असेल त्यांनीच फक्त या गाडीत चढावे असे ओरडून सांगितले. आमच्याकडे एनजे ट्रान्झिट या वेगळ्या कंपनीचे तिकीट होते म्हणून आम्ही त्या गाडीने जाऊ शकत नव्हतो. आणखी थोड्या वेळाने एनजेटीची ट्रेन आली. ती सिंगल डेकर होती. या रूटवर बहुतेक ट्रेन डबल डेकर असतात, पण या वेळेला साधी एकमजली गाडीच आली होती आणि ती प्रवाशांनी भरलेली होती. रविवार असल्यामुळे रेल्वेगाड्या रिकाम्या जात असतील असे आम्ही समजून होतो पण  कदाचित त्या दिवशी भारतीय स्वातंत्र्यदिन पहायला आणखी बरेच लोक निघाल्यामुळे जास्त गर्दी झाली असेल.  मला एक रिकामी जागा दिसली ती मी पटकन पकडली. नंतर इतरांनाही बसायला जागा मिळाल्या, पण निरनिराळ्या रांगांमध्ये.

चाळीस मिनिटांच्या प्रवासानंतर आम्ही न्यूयॉर्कच्या पेन स्टेशनाला पोचलो. आधी आम्ही गाडीत निरनिराळ्या ठिकाणी बसलो होतो आणि हा शेवटचा थांबा आल्यानंतर फलाटावर उतरून सगळे एकत्र आलो. हे पेन स्टेशनसुद्धा एक अजूबा आणि भूलभुलैयाच आहे. हे स्टेशन यायच्या आधीच आमची गाडी एका मोठ्या बोगद्यात शिरली आणि ती स्टेशनात जिथे येऊन उभी राहिली तो भागही पाताळातच होता. तिथून वर चढून बाहेर जाण्यासाठी अनेक सरकते जिने आणि कॉरीडॉर्स होते. अमूक ठिकाण या बाजूला आणि तमूक ठिकाण त्या बाजूला असे बाण दाखवणारे फलक जागोजागी दिसत होते, पण आमच्यासाठी अमूक, तमूक आणि ढमूक या सगळ्याच जागा अनोळखी असल्यामुळे त्यातून आम्हाला विशेष दिशादर्शन होत नव्हते. आम्ही आंधळ्यासारखे चाचपडत अखेर एका दरवाजामधून त्या अवाढव्य स्टेशनच्या बाहेर निघालो तेंव्हा कुठे सूर्याचा उजेड दिसला.

ही भारतीय परेड पाहण्यासाठी ३८नंबरच्या स्ट्रीटवर जायचे आहे एवढीच माहिती आमच्याकडे होती. तो रस्ता कुठे आहे हे शोधणे सुरू झाले. ७ की ८ नंबरचे दोन अॅव्हेन्यूज ओलांडून पुढे जात असतांना कुठेतरी ३३ की ३४ नंबरची पाटी दिसली त्यावर जाऊन पुढे शोधायचे होते. तेवढ्यात पोलका डॉटच्या एकसारख्या साड्या नेसलेल्या सातआठ भारतीय महिलांचा एक ग्रुप आमच्यामागून आला आणि झपाझपा पुढे गेला. त्यासुद्धा या मिरवणुकीला निघाल्या आहेत का एवढे आम्ही त्यांना विचारून घेतले आणि त्यांच्या मागेमागे जात ३८ नंबरच्या स्ट्रीटवर जाऊन पोचलो. आमच्या ओळखीची कुलकर्णी मंडळी तिथे होतीच. त्यांची मुलगी शोभायात्रेतल्या एका ढोलताशा पथकात भाग घेणार होती. खरे तर आम्ही त्यांना मेट्रोपार्क स्टेशनवरच भेटणार होतो आणि त्यांच्याबरोबर जायचे असे ठरले होते. पण आमची गाडी चुकल्यामुळे तिथे आमची चुकामूक झाली होती. ३८ नंबरच्या रस्त्यावर बरीच उत्साही भारतीय मंडळी शोभायात्रेच्या तयारीत उभी होती, पण आम्ही पोचेपर्यंत तो कार्यक्रम सुरू झाला नव्हता. 


न्यूयॉर्क शहरातही मुंबईतल्यासारखे काही उत्तर दक्षिण जाणारे लांब हमरस्ते आहेत, त्यातलाच एक मॅडिसन अॅव्हेन्यू नावाचा रस्ता आहे. त्या रस्त्याचा एक लहानसा भाग भारत दिनाच्या परेडसाठी दुपारच्या तीन तासासाठी राखून ठेवला होता.  तेवढ्या वेळासाठी त्या रस्त्याने होणारी वाहतूक  दुसऱ्या रस्त्यांवरून वळवली होती. त्या हमरस्त्याला छेद देणाऱ्या ३७, ३८ सारख्या काही उपरस्त्यांवर अनेक लोक आपापले चित्ररथ आणि पथके घेऊन येऊन थांबले होते. त्यातच एक न्यूजर्सीमधील मराठी मंडळींचे जल्लोश नावाचे ढोलताशा पथक होते.  या पथकात अनेक उत्साही तरुण आणि त्यांच्यापेक्षाही जास्त उत्साही युवती मोठमोठे ढोल आणि ताशे गळ्यात बांधून त्यांना सांभाळत आणि तालात बडवत होते, काही जणांनी मोठमोठ्या झांजा हातात घेतल्या होत्या तर अनेक मुली लेझिम वाजवत नाचत होत्या. मधून मधून कोणी तरी छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम्, भारतमाता की जय वगैरे घोषणा करत होता.  काही जणांनी मोठमोठे तिरंगी झेंडे आणि इतर काही झेंडे सांभाळले होते. त्यातल्या एका झेंड्यावर जाणता राजा अशी अक्षरे लिहिली होती. सर्वांनी भारतीय आणि मुख्यतः महाराष्ट्रीय परंपरागत पद्धतीची वेशभूषा केलेली होती. अनेकांनी डोक्यावर पागोटी घातली होती. 

    


त्या पथकात भाग घेणारी सुमारे पन्नास साठ मंडळी आणि त्यांचे शंभर दीडशे आप्त अशी सगळी गर्दी त्या ३८व्या रस्त्यावर जमा झालेली होती. अजून मुख्य शोभायात्रेची सुरुवात झालेली नसली तरी हे लोक त्याची पूर्वतयारी म्हणून जोरजोरात ढोलताशेझांजा बडवून जल्लोशाची वातावरण निर्मिती करत होते. तिथे आजूबाजूला कोण लोक रहात असतील आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया असतील त्या कदाचित तिथल्या लोकांच्या सोशल मीडियावर आल्या असल्या तरी त्या आम्हाला कळायचा मार्ग नव्हता.  आम्ही थोडा वेळ तिथे थांबून इतर चित्ररथ पहात पहात पुढे जाऊन मॅडिसन अॅव्हेन्यूवर गेलो आणि एक मोक्याची जागा पकडली. तिथे रस्त्याच्या कडेला एका झाडाची थोडी सावली होती, मागे एक खाद्यपेयांचे दुकान होते आणि ते घेऊन बाहेर आणून खाण्यासाठी रस्त्यावर एक बेंचही ठेवला होता.



भारत दिनाची परेड दुपारी बारा वाजता सुरू होणार आहे अशी माहिती आम्हाला मिळाली होती आणि पहिली गाडी चुकली तरीही आम्ही तिथे वेळेवर जाऊन पोचलो होतो. रस्त्यावर अनेक सजलेले चित्ररथ तसेच पायी चालणारी मंडळी जय्यत तयारीत दिसत होती. अग्रभागी संचलन करणारे सुटाबुटातले गणवेशधारी युवकही तयार होते, त्यांचा बँडही समोर उभा होता, पण परेड का सुरू होत नव्हती, ती कुणासाठी थांबली होती ते समजत नव्हते. निरनिराळ्या आवाजात इतके कर्णे किंचाळत असले तरी या परेडबद्दल काही घोषणा होत नव्हती. बघे लोकही नुसतीच चुळबुळ करत होते.


बराच वेळ वाट पाहून झाल्यानंतर एकदाचा हिरवा कंदील मिळाला आणि शोभायात्रा हलायला लागली. सर्वात पुढे दोन घोडे हळूहळू चालत होते, त्यांच्या मागे न्यूयॉर्क पोलिसांचा बँड होता. त्याच्या मागे चार तरुण चार मोठे झेंडे घेऊन चालत होते. अर्थातच त्यातला एक अमेरिकेचा आणि एक भारताचा राष्ट्रध्वज होता. उरलेले दोन कदाचित न्यूयॉर्क राज्य व न्यूयॉर्क शहर यांचे किंवा पोलिसखात्यांचे असावेत. अमेरिकेत ज्याचा त्याचा स्वतंत्र झेंडा असतो आणि तो कुणी कुठे किंवा कधी लावावा अथवा लावू नये असे काही नसते. आम्ही ज्या भागात रहात होतो तिथल्या सात आठ घरांसमोर नेहमीच रंगीबेरंगी झेंडे फडकत असायचे. मिरवणुकीतल्या ध्वजधारकांच्या मागून न्यूयॉर्क पोलिसखात्यात काम करणारे भारतीय वंशाचे वीसपंचवीस अधिकारी त्यांच्या गणवेशात शिस्तीत चालत होते. एवढीच काय ती शिस्तबद्ध परेड होती, पण त्यांच्या मागे खूप चित्ररथ आणि पायी चालणारी अनेक पथके होती.  


न्यूयॉर्कमधल्या पोलिसखात्यातील दोन विभागांच्या गाड्याही त्यांच्या संचलनामध्ये दिसत होत्या. एक संचलन पुढे निघून गेल्यानंतर मध्ये थोडी मोकळी जागा सोडून मागची पार्टी नाचत नाचत पुढे येत होती. तेलुगू लोकांच्या समूहात सगळ्यात समोर एक श्रीरामचंद्राची वेशभूषा केलेला धनुर्धर होता आणि त्याच्या बरोबर एक नखशिखांत सजलेली भारतमाता चालत होती. त्या दोघांच्या मागेमागे एक राक्षसासारखा दिसणारा माणूस दोन्ही हातात दोन आसूड घेऊन त्यांना स्वतःभोवती नुसताच फिरवत होता. मी लहानपणी कडकलक्ष्मी नावाचा एक प्रकार लहान गावातल्या रस्त्यांवर पाहिला होता हे सोंग तसेच काहीतरी दिसत होते, पण त्याच्या आसुडाचा फटका त्याला बसतच नव्हता. त्यांच्या चित्ररथावर एक मोठी गणपतीबाप्पाची मूर्ती आणि तिच्या आजूबाजूला मंदिराचा देखावा केलेला होता आणि अधून मधून  ते लोक घंटा वाजवून गणेशाचा जयजयकार करत होते. त्यांच्या मागे जल्लोश पथक ढोलताशा, झांजा वगैरे वाजवत आणि लेझिम खेळत पुढे सरकत होते.


या शोभायात्रेसाठी आंतरराष्ट्रीय योगगुरु श्री श्री रविशंकरजी एक मुख्य अतिथि होते. त्यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगचा मोठा चित्ररथ बराच मागून येत होता, पण गुरुजी त्यांच्या अनेक शिष्य किंवा भक्तांच्या बरोबर पायीच चालत येतांना दिसले. खरे तर ते आजूबाजूच्या इतर उंच लोकांच्या मागे झाकून गेले होते, त्यामुळे मला त्यांचे अगदीच ओझरते दर्शन झाले. त्यांच्या मागे मागे मिशन इन लाइफ नावाचा फ्लोट येत होता. याशिवाय  योगा कम्युनिटी या नावाचा एक वेगळा ग्रुप हातात काही फलके घेऊन या परेडमध्ये भाग घेत होता.


नवी दिल्लीमधील  गणतंत्रदिनाच्या संचलनातले चित्ररथ भारत सरकारची निरनिराळी खाती आणि काही  राज्य सरकारे यांनी तयार करवून घेतलेले असतात आणि दूरदर्शनाच्या माध्यमातून कोट्यावधी लोक ते पहात असतात. ते तयार करण्यासाठी भरपूर खर्चही केला जातो आणि वेळही दिला जातो. अर्थातच ते खरोखरच भव्यदिव्य असतात. न्यूयॉर्कच्या एका रस्त्यावरून काढलेली ही इंडिया परेड आमच्यासारख्या काही लोकांनी प्रत्यक्ष पाहिली असेल आणि आणखी काही लोकांनी ती नंतर यूट्यूबवर पाहिली असेल. त्यामुळे त्याला फारसे प्रसिद्धीमूल्य नव्हतेच. यातले सगळे चित्ररथ खाजगी संस्था किंवा कंपन्यांनी स्वखर्चाने तयार केले होते आणि त्यांचे बजेटही जास्त असायचे कारण नव्हते. त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेबद्दल फार जास्त अपेक्षा ठेवण्यात अर्थ नव्हता. मुळात ते तयार केले गेले आणि काढले गेले यालाच महत्व होते.


या चित्ररथांमध्ये खूप विविधता होती.  मिशन इन लाइफ या संस्थेकडून पर्यावरणाची काळजी घेण्याचा संदेश दिला जात होता, अन्न हवे असेल तर जमीनीची काळजी घ्या असे ते सांगत होते, तर न्यूजर्सी सिद्धीविनायक नावाचे मंडळ आपल्या गणेशोत्सवाला या असे आवाहन करत होते. एका संस्थेने स्कॉटिश बॅगपाइपर्सचा बँड आणला होता, तो चक्क हिंदी गाणी वाजवत होता. तसाच एक पनामातल्या लोकांचा बँड होता. त्यांचा त्या संस्थांशी किंवा भारताशी काय संबंध होता कोण जाणे! बॉलिवुडची एक अभिनेत्री जॅकेलिन फर्नांडिस ही आणखी एक सेलिब्रिटी होती. ती मात्र एका फ्लोटवर समोर उभी राहून सर्व प्रेक्षकांना अभिवादन करत होती. तो फ्लोट कुणाचा होता ते मला आता आठवत नाही.  बादशाह मसाले ही भारतीय कंपनी आणि डंकिन डोनट्स ही अमेरिकन कंपनी आपापल्या जाहीराती करत होत्या. आहारामध्ये 'मिलेट्स' म्हणजे ज्वारी, नाचणी यासारख्या धान्यांचा वापर करा असा प्रचार करणारा एक चित्ररथ होता.  पांढऱ्या शुभ्र वेशातले ब्रह्मकुमारींचे साधक आणि भगिनींचा एक मोठा जमाव भारताचे आणि त्या संस्थेचे ध्वज घेऊन चालत होता. जगभरातल्या अनेक देशांमध्ये भगवान स्वामीनारायणाची सुंदर मंदिरे बांधणाऱ्या बीएपीएस या संस्थेने दिल्लीतल्या अक्षरधामची प्रतिकृति असलेला सुंदर चित्ररथ आणला होता. स्टेटबँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय या बँकांच्या अमेरिकेतल्या मुख्य शहरांमध्ये शाखा आहेत. त्यांनी याबद्दल माहिती देणारे फ्लोट्स ठेवले होते. एका समूहात उत्तर अमेरिकेतले मुस्लिम एकत्र चालत होते, त्याचप्रमाणे अमेरिकेत रहाणाऱ्या काश्मीर, बिहार आणि झारखंड वगैरे ठिकाणच्या लोकांच्या संघटनांचे चित्ररथ होते. मला सगळ्यात जास्त आश्चर्य याचे वाटले की फलूनदफा अशा विचित्र नावाच्या एका समूहात पिवळा गणवेश घातलेले जवळ जवळ शंभर लोक होते आणि ते सगळे मंगोल वंशीय दिसत होते. टाइम्स नाउ आणि टीव्ही एशिया या माध्यमांनीही आपली उपस्थिति दाखवणारे फ्लोट्स आणले होते. अशा प्रकारे ती एक खूप मोठी मिरवणूक होती. फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्सतर्फे न्यूयॉर्कच्या रस्त्यावरून काढलेली ही मिरवणूक भारताबाहेरील भारतीयांनी केलेला सर्वात मोठा जाहीर सोहळा आहे अशी जाहिरात केली जात होती. ती पाहतांना मलाही देशाभिमानाबरोबर थोडे आश्चर्यही वाटत होते.


Tuesday, May 21, 2024

न्यू जर्सी २०२३

 मी २००८साली पहिल्यांदा अमेरिकेला म्हणजे यूएसएला गेलो होतो तेंव्हा नेवार्क इथल्या लिबर्टी इंटरनॅशनल विमानतळावर विमानातून उतरलो होतो. पण ते विमानतळ न्यूजर्सीमध्ये होते हे मला तेंव्हा माहीत नव्हते. किंबहुना न्यूजर्सी कशाला म्हणतात तेही मला ठाऊक नव्हते. त्या वेळी आम्ही नेवार्कला विमान बदलून मुलाकडे अॅटलांटाला गेलो होतो. नंतर न्यूयॉर्कदर्शनासाठी पुन्हा नेवार्कला आलो तेंव्हा पारसीपेनीला रहात असलेल्या आमच्या नातेवाइकाने आम्हाला कारने तिथून त्याच्या घरी नेले. न्यूजर्सी या नावाचे शहर नसून ते एक संस्थान किंवा राज्य(स्टेट)आहे आणि नेवार्क, पारसीपेनी यांच्यासारखी खूप गावे त्या संस्थानात आहेत एवढी माहिती त्याच्याशी बोलतांना समजली. पारसीपेनी हे टुमदार गाव न्यूयॉर्क किंवा अॅटलांटासारख्या महानगरांपेक्षा खूपच वेगळे दिसले आणि मला आवडले होते. न्यूजर्सीमधल्या दुसऱ्या कुठल्या भागात जाणे आमच्या त्या वेळच्या प्लॅनमध्ये नव्हते. मी न्यू जर्सीच्या म्हणजे मुख्यतः पारसीपेनीच्या भेटीवर तेंव्हा लिहिलेला लेख या पानावर आहे. https://anandghan.blogspot.com/2009/06/blog-post_20.html

मी पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१९मध्ये दुसऱ्यांदा अमेरिकेत गेलो होतो तेंव्हा कॅलिफोर्नियामधल्या टॉरेन्स नावाच्या शहरात माझ्या मुलाकडे रहात होतो, हे नाव भारतात कुणाच्या ओळखीचे नव्हते म्हणून मी एले किंवा लॉस एंजेलिसला राहतो असे बाहेरच्या सगळ्यांना सांगत होतो. ते मोठे शहर टॉरेन्सहून जवळ होते आणि आम्ही बऱ्याच वेळा तिथे जाऊन येत होतो. त्यामुळे तसे सांगणे मला फारसे चुकीचे वाटत नव्हते.


त्यानंतर २०२३मध्ये मी तिसऱ्यांदा अमेरिकेला गेलो तेंव्हा चार महिने न्यूजर्सीमध्येच मुक्काम ठोकून राहिलो होतो.  या वेळी मी न्यूजर्सीमध्ये जिथे रहात होतो, त्या इथल्या गावाचे नाव साउथ प्लेन फील्ड असे होते. हे गाव न्यूजर्सीमधल्या मिड्लसेक्स काउंटीमध्ये आहे. त्याला इकडे 'बरो' असे म्हणतात. हा खेडे आणि शहर यांच्या मधला प्रकार असावा. हे नाव तर अमेरिकेतल्या लोकांनासुद्धा अनोळखी वाटायचे.  या गावाला लागूनच एडिसन नावाचे लहानसे शहर आहे ते न्यूजर्सीमधल्या लोकांना माहीत होते, पण भारतातून निघायच्या आधी हे नावसुद्धा मी कधी ऐकलेले नव्हते. जवळचे खरे मोठे शहर म्हणजे न्यूयॉर्कच, पण ते आमच्या घरापासून खूपच दूर होते आणि आमचे तिथे नेहमी जाणे येणे होत नसे. माझ्या चार महिन्याच्या राहण्यात फक्त एकदा आम्ही सगळे न्यूयॉर्क सिटीमध्ये जाऊन आलो. गंमत म्हणजे मी न्यूजर्सीला जाणार आहे एवढेच सांगणे भारतातल्या लोकांसाठी मात्र पुरेसे होते. खूप भारतीय लोक तिकडे जाऊन रहात असल्यामुळे न्यूजर्सी नावाचेच एक गाव असावे असेही तिथे कधी न गेलेल्या लोकांना वाटत असावे.

न्यूयॉर्क शहर आणि आमचे साउथप्लेन फील्ड यातसुद्धा काहीच साम्य नाही. अगदी माझ्या लहानपणापासून मी असे ऐकत आलो होतो की न्यूयॉर्कमध्ये सगळ्या अवाढव्य गगनचुंबी इमारती आहेत. तिथली एंपायर स्टेट बिल्डिंग अनेक वर्षे जगातली सर्वात उंच इमारत म्हणून प्रसिद्ध होती. आता इतर काही शहरांमध्ये तिच्याहून उंच इमारती बांधल्या गेल्या आहेत आणि आणखी काही बांधल्या जात आहेत. आम्ही न्यूयॉर्कच्या ज्या भागात फिरून आलो तिथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रचंड उंच इमारतींचे भव्य ठोकळे आणि रस्त्यांमध्ये वाहनांची तुफान गर्दी असे त्या महानगराचे टिपिकल दृष्य होते. 

पण आम्ही न्यूजर्सीच्या ज्या भागात रहात होतो, तिथे फक्त अनेक लहान लहान दुमजली इमारती होत्या आणि त्यांच्या आजूबाजूला भरपूर मोकळी जागा आणि झाडी होती. त्या झाडांमागे या इमारती दडून जात होत्या. तिथे शांतता तर इतकी होती की नेहमीच चिमण्यांची चिवचिव सहज कानावर पडत असे. तिथल्या मुख्य रस्त्यांवरून बरीच वाहने फिरत होती, पण गावामध्ये आम्हाला क्वचितच कुठे ट्रॅफिक जॅम पहायला  मिळाला. गावाबाहेर गेल्यावर तिथल्या अगदी ग्रामीण भागातल्यासुद्धा सगळ्या मुख्य रस्त्यांवर जिकडे तिकडे उड्डाणपूल बांधलेले असल्यामुळे मैलोंगणती प्रवासात सहसा कुठे ट्रॅफिक सिग्नल लागत नसे. तरीही तिथल्या हमरस्त्यांवरच अधून मधून ट्रॅफिक जॅम लागत असे आणि जीपीएस तुलनेने कमी गर्दी असलेले पर्यायी मार्ग दाखवत असे. अशा रस्त्यांवरून जातांना केवळ जीपीएसच्या सहाय्याने किंवा त्याच्या भरोशावरच आपल्या गंतव्य ठिकाणी जाऊन पोचणे शक्य असे. छापील नकाशा पाहून रस्त्यावरून जातांना चौकाचौकात थांबून चौकशी करून योग्य त्या दिशेला जाणे ही गोष्ट आता अमेरिकेत तरी इतिहासजमा झाली आहे.

तिथे ओक ट्री अॅव्हेन्यू आणि साउथ प्लेनफील्ड अॅव्हेन्यू नावांचे दोन मुख्य रस्ते आहेत. ओक ट्री अॅव्हेन्यू  हा साउथ प्लेनफील्डमधला मुख्य मोठा रस्ता आमच्या घरातून पाहिल्यास मागच्या बाजूला थोड्याच अंतरावर दिसतो, पण घराच्या पुढच्या बाजूला असलेल्या दाराने घराबाहेर पडून तिथे जाऊन पोचायला थोडा वेळ लागतो.  ओक ट्री अॅव्हेन्यूला डॉर्सेट ड्राइव्ह नावाचा एक फाटा फुटतो. त्याच्या सुरुवातीलाच "नो एक्झिट" असे ठळक अक्षरात लिहिलेला मोठा फलक आहे. याचा अर्थ तुम्ही आपली मोटार या रस्त्यावरून आत नेली तर तुम्हाला पुन्हा तिथूनच बाहेर पडायला पाहिजे. आतल्या भागाला बाहेरच्या जगाशी जोडणारा दुसरा रस्ताच नाही. त्या आतल्या भागाला कुठले वेगळे नावही नाही. त्यात काही लहान लहान रस्ते आहेत आणि त्यांच्या बाजूला बंगले आहेत. त्यातल्या एका बंगल्यात माझे वास्तव्य होते. तिथेच एक कॉटन स्ट्रीट पार्क आहे, तिथे जाणारी एक लहानशी कॉटन स्ट्रीट आहे, पण पार्क म्हणून तिथे मोठ्या लोकांना बसायला बाकडीही नाहीत की लहान मुलांना खेळायचीही काही सोय नाही, फक्त शंभर दीडशे उंच उंच झाडांचे एक दाट रान आहे.

मी दोन तीनदा चालत चालत तिथे फिरायला गेलो तेंव्हा मला दुसरा कोणी माणूस तिथे आलेला दिसला नाही. त्यामुळे मी रोज संध्याकाळी आमच्या वसाहतीतल्या आयताकृति चौकोनातच तीन चार चकरा मारून येत होतो. इथे मात्र सगळ्याच बंगलेवाल्यांनी आपापल्या अंगणांमध्ये एकाहून एक सुंदर फुलांची झाडे लावली आहेत आणि मी समर सीझनमध्ये गेलो होतो त्या काळात सगळी झाडे छान फुललेली होती. संध्याकाळच्या वेळी काही लोक अंगणात लॉन मोविंग करतांना दिसत, काही लोक किंवा महिला कुत्र्यांना घेऊन फिरायला पडलेल्या दिसत आणि काही लहान मुले रस्त्यांच्या कडेला खेळतांना दिसत. अशा प्रकारे रोज निदान दहापंधरा लोकांशी "हॅलो हाय" होत असे. अमेरिकेतले लोक जास्त संबंध ठेवत नसले तरी अनोळखी माणूस समोर आला तरी नजरानजर होताच स्मितहास्य करतात. ही एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे दोघांनाही बरे वाटते.

ओक ट्री अॅव्हेन्यू या मुख्य रस्त्याने पूर्वेकडे गेल्यावर एक चौक लागतो त्या चौकापासून पुढे याच रस्त्याचे नाव ओक ट्री रोड असे ठेवले आहे. तसेच पुढे गेल्यावर एक अगदी लहानसा पूल लागतो आणि त्याच्या पलीकडे एडीसन शहर सुरू होते. ओक ट्री रोड त्या शहराच्या आरपार जातो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वस्ती तशी थोडी विरळच आहे, पण ती पूर्णपणे एकमेकींमध्ये मिसळून गेली असल्यामुळे आपण एका गावातून निघून दुसऱ्या गावात शिरत आहोत असे मात्र  जाणवत नाही.

ओक ट्री रोडवरून पुलाच्या पलीकडे मैल दीड मैल पुढे गेल्यावर तिथला मुख्य बाजार आहे त्यातली अनेक  दुकाने आणि हॉटेलेसुद्धा भारतीय लोकांनी चालवलेली आहेत. पटेल ब्रदर्स नावाच्या किराणा मालाच्या दुकानाच्याच दोन मोठ्या शाखा आहेत, त्याशिवाय इंडियन ग्रोसरी नावाचे वेगळे मोठे दुकान आहे.  भारतीय म्हणजे मराठी, गुजराथी, कानडी, तेलुगू वगैरे सगळ्या लोकांच्या स्वयंपाकघरात ज्या ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या इथे सहज मिळतात. कधीकधी सकाळचा नाश्ता करण्यासाठीसुद्धा आम्ही सरावणा भवन, अम्माज किचन किंवा सुखाडिया स्वीट्स सारख्या ठिकाणी जाऊन इडली, डोसा, उत्तप्पा, ढोकळा, फाफडा, जलेबी वगैरे खाऊन येत होतो. एडिसनमधल्या पटेल स्टोअर्समध्ये ढोकळा, समोसा, कचोरी, खाखरा, भाकरी वगैरेंचा ताजा मालही मिळत असे. आम्ही अनेक वेळा तो आणून मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खात होतो. या सगळ्या गोष्टी घरी तयार करण्याची सोयही होतीच. त्यासाठी आवश्यक ती मिश्रणे, पिठे, बॅटर वगैरेही बाजारात सहज मिळत होती. त्यामुळे माझ्या इथल्या वास्तव्यात माझे सगळे खाणेपिणे अगदी भारतातल्यासारखेच होत होते.
 
मी तिकडे गेल्यावर पहिल्याच रविवारी सकाळी माझा मुलगा मला नाश्ता करण्यासाठी जवळच्या एडिसन शहरात घेऊन गेला. तिथे सरावणाभवन नावाचे दक्षिण भारतीय हॉटेल होते. ते बहुधा उडप्यांचे नसावे. आत गेल्यावर पाहिले की ते बऱ्यापैकी भरले होते. बहुतेक सगळ्या टेबलांवर कोणी कोणी बसले होते ते एकूण एक सगळे लोक भारतीय दिसत होतेच, त्यातही दक्षिण भारतीय जास्त होते. एक दोन तर चक्क लुंगी गुंडाळून आले होते. कानावर तामीळ तेलुगू शब्द पडत होते, तसे आमच्यासारखे मराठमोळेही होते. इडली, वडा, दोसा, उत्तप्पा वगैरे ओळखीच्या पदार्थांच्या निरनिराळ्या व्हरायटीज होत्या त्यांची चव आपल्या इकडल्यासारखीच होती. जोडीला चविष्ट सांभार आणि चटणी होतीच. तीसुद्धा मला मानवण्याइतपतच तिखट होती. इतर कुणाला सपकच वाटत असेल. तिथे बसलो असतांना आपण सातासमुद्रापलीकडल्या अमेरिकेत आलो आहोत असे अजीबात वाटत नव्हते. दोन तीन आठवड्यांनंतर आम्ही तिथल्या जवळच्या अम्मा किचनमध्ये नाश्ता करायला गेलो. तिथल्या एका भिंतीवर जयललिताचा खूप मोठा पोस्टर लावला होता. त्यावरून ही कोणती अम्मा आहे हे लक्षात आले. त्या हॉटेलात फक्त पाच डॉलरमध्ये एक काँबो मेन्यू होता तोसुद्धा मला पुरेसा वाटला. 

दोन महिन्यांनंतर पुन्हा एकदा नाश्त्यासाठी बाहेर पडल्यावर मी म्हंटले या वेळी वेगळे काही तरी खाऊ. मग त्याच भागातल्या सुखाडिया स्वीट्समध्ये शिरलो. हे मुख्यतः मिठाईचे दुकान आहे. पुण्यातल्या काका हलवाई किंवा चितळे बंधू यांच्याकडे जितक्या मिठाया मिळतात तशीच विविधता तिथेही होतीच. त्या मिठाया घेऊन जाण्यासाठी बरीच गिऱ्हाइके येत होती आणि आपापल्या आवडीची पॅकेट्स घेऊन जात होती. पण एका बाजूला आठदहा टेबले लावून तिथे बसून खायची व्यवस्थाही होती. त्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी इथे मात्र फारसे कोणी आले नव्हते. तिथे संध्याकाळी भेळ, पाणीपुरी खाणाऱ्यांची गर्दी होते आणि त्यांच्यासाठी बाहेर अंगणात खुर्च्या मांडाव्या लागतात असे ऐकले.  आम्ही गुजराथी स्टाइलमध्ये 'फाफडा अने जलेबी' घेतली. ती बरी होती, पण आमच्या वाशीच्या फरसाणवाल्याच्या ताज्या गरमागरम वस्तू जास्त मजेदार असायच्या. 

पुणेमुंबई महामार्गावर टोलनाक्यांजवळ फूडमॉल आहेत आणि तिथे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात. बहुतेक प्रवासी तिथे दहापंधरा मिनिटे थांबून आपापल्या रुचीप्रमाणे थोडी खाद्यंति करतातच. अमेरिकेतल्या महामार्गांवर थोड्या थोड्या अंतराने असे विसावे असतात आणि तिथे केएफसी, सबवे, मॅकडोनाल्ड, बर्गरकिंग, डंकिन डोनट्स वगैरे फास्टफूडचे स्टॉल्स असतात. पण या कंपन्यांना भारतात जितकी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे तशी अमेरिकेत नाही. ते दरिद्री लोकांचे 'जंकफूड' असते असे म्हणून तिथले काही शिष्ट लोक नाके मुरडतात. मी मात्र त्यांच्यावर तसा अन्याय केला नाही. जिथे जे मिळाले ते चाखून पाहिले.

आम्ही थॉमस एडिसनच्या प्रयोगशाळेला भेट देऊन परत येतांना आम्हाला तसा थोडा उशीरच झाला होता. आजूबाजूच्या भागात कोणकोणती भोजनालये आहेत याची गूगलवर चौकशी केली. काही अंतरावर एक थाइ रेस्तराँ दिसत होते, पण ते त्या वेळी लंचब्रेकसाठी बंद होते.  इकडेतिकडे शोध घेता एक पंजाबी ढाबा दिसला पण तो प्रत्यक्ष बघून कुणालाही आवडला नाही. पुन्हा थाइ रेस्तराँला फोन लावला तर त्याने आम्हाला यायला हरकत नाही असे सांगितले. मग नकाशावर ते शोधून काढले आणी तिथे शिरलो.  ती धड दुपारच्या जेवणाची वेळ नव्हती आणि रात्र पडायला तर खूपच वेळ होता.  तरीही तिथे बऱ्यापैकी जेवण मिळाले.

माझी भारतात परत यायची वेळ झाली असतांनाच आम्हाला समजले की न्यूजर्सीमध्येच एक अतिभव्य असे अक्षरधाम मंदिर बांधले गेले आहे. म्हणून आम्ही ते पहायला गेलो. यापूर्वीचा आमचा असा अनुभव होता की या स्वामीनारायण मंदिरांमध्ये उत्कृष्ट भोजनाची व्यवस्था असते. तशी तिथेही असणार अशी आमची अपेक्षा होती. पण आम्हाला त्या देवळाच्या आवारातही प्रवेशच मिळाला नाही. शिखर दर्शन घेऊन परत फिरावे लागले. मग वाटेत एक  बावर्ची बिर्याणी पॉइंट मिळाले.

मी न्यू जर्सीमध्ये गेलो असतांना एकदा आम्ही तिथल्या एका ठिकाणी रात्रीच्या जेवणासाठी गेलो होतो. त्या जागेचे नाव होते रेनफॉरेस्ट कॅफे. वेलींच्या कमानीमधून आत शिरतांनाच एका अजस्र अजगराचा फणा फुस्सकन अंगावर आला. दचकून पाहिले तर तो एका झाडाच्या फांदीवरून खाली लटकत होता. तो खरा नव्हता पण हुबेहूब जीवंत वाटत होता. त्या हॉटेलाच्या मोकळ्या जागेत दाटीवाटीने खूप झाडे लावलेली होती, त्या झाडांना अनेक वेलींनी विळखे घातलेले होते, त्या झाडांमधली कुठली खरी होती आणि कुठली कृत्रिम होती तेही समजत नव्हते, पण एकंदरीत तिथे  घनदाट अरण्याचा आभास निर्माण केला होता. मुख्य म्हणजे त्या झाडांच्या फांद्याफांद्यांवर असंख्य लहानमोठे वन्य पशु आणि रंगीबेरंगी पक्षी बसलेले होते किंवा काही झुडुपांच्या आडून डोकावत होते. सगळीकडे मंद धूसर प्रकाश होता आणि त्या जंगलातच चाळीस पन्नास टेबले विखरून ठेवली होती. त्यातली बहुतेक टेबले भरलेली होती म्हणजे तितकी माणसेही होती पण त्यांची गर्दी जाणवत नव्हती. त्या वातावरणाला पोषक असे गूढरम्य पाश्चात्य संगीताचे स्वर घुमत होते. आम्हाला जे टेबल मिळाले होते त्याच्या जवळच एक कृत्रिम धबधबा होता आणि त्याच्या पार्श्वभूमीवर एका दांडगोबाचा पुतळा होता. अँबियन्स इतका छान होता आणि खाद्यपदार्थही त्याला साजेसे होते. एकंदरीत एक लक्षात राहण्यासारखा अनुभव घेऊन आम्ही खुषीत परत आलो.  

पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक आहेच आणि म्हणून आपण दिवसभर पाणी पीत असतो. आपल्या डोळ्यांनासुद्धा जलाशय नुसते पहायलाही आवडतात. समुद्र किंवा मोठ्या नद्यांच्या किनारी असलेल्या गावांमधले लोक  वेळ मिळाला की किनाऱ्यावर जाऊन मंद वाऱ्याची मजा घेत इकडे तिकडे फिरतात किंवा पाण्याच्या लाटा पहात आणि त्यांचे संगीत ऐकत एकाद्या ठिकाणी बसून राहतात. भोपाळ, हैदराबाद आणि बंगलोर या शहरांमध्ये मोठ्या नद्या नसल्या तरी सुंदर विस्तीर्ण तलाव आहेत. पर्यटक ते पहायला जातात. कोल्हापूरचे रंकाळा, सोलापूरचा सिद्धेश्वर तलाव आणि पुण्याच्या खडकवासला धरणाच्या काठावरसुद्धा संध्याकाळी चांगलीच गर्दी असते, कारण लोकांना पाण्याचे असे सान्निध्य आवडते.

मी न्यूजर्सीमधल्या साउथ प्लेनफील्ड नावाच्या लहानशा गावात रहात होतो. अशा लहानशा गावाला लागून एक स्प्रिंग लेक पार्क आहे. त्यात एक बऱ्यापैकी मोठे तळे आहे. त्या तळ्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी कडेकडेने रस्ता बांधला आहे. तळ्याच्या एका भागात पाण्यातच सुंदर कारंजी बांधली आहेत बसून आराम करायला एक छान चबूतरा आहे, तिथे बसायला बाकडी ठेवली आहेत. आजकाल अमेरिकेतले लोक रस्त्यांवरून पायी चालतांना सहसा दिसत नाहीत, पण ते मोटारीत बसून या पार्कमध्ये येतात आणि तिथे तलावाभोवती पायी चालतात किंवा जॉगिंग करतात. इथे लहान खेडेगावातसुद्धा आपल्याला रस्त्याच्या कडेला हवी तिथे गाडी उभी करून ठेवता येत नाही. त्यामुळे आम्ही आधी गाडी पार्क करण्यासाठी योग्य अशी जागा शोधली आणि तिथून पार्कमध्ये तळ्याकाठी चालत जाऊन त्याला प्रदक्षिणा घातली.   


आपण निसर्ग म्हणजे झाडे,झुडुपे,गवत,पाने,फुले वगैरे एवढेच समजतो. खेड्यांमध्ये रहाणाऱ्यांच्या आजूबाजूला सगळीकडे असा निसर्ग पसरलेलाच असतो. तो पावसाळ्यात हिरवा गार दिसतो,  उन्हाळ्यात कोमेजून जातो, पावसाचे थेंब पडले की पुन्हा टवटवीत होतो, निरनिराळ्या फुलांच्या मोसमांमध्ये फुलांनी बहरून जातो, असे पानाफुलांमधून आपले अनेक रंग दाखवत असतो.  शहरात जाऊन निर्जीव दगडाविटांच्या घरांमध्ये रहायला लागलेल्या लोकांना निसर्गापासून दूर वाटायला लागले तेंव्हा त्यांनी बागा, उद्याने वगैरे करून दोन घटका निसर्गाजवळ रहाण्याची सोय करून घेतली. मग त्यातच लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळे, घसरगुंड्या वगैरेंनी युक्त असे पार्क झाले. प्रेमी युगुलांची आडोशाला भेटायची सोय झाली, तसेच वयस्क लोकांना सावकाशपणे पायी फिरण्यासाठी सोयिस्कर वाटा, बसून विश्रांती घेण्यासाठी बाकडी वगैरेंनी सुसज्ज असे नानानानी पार्कही झाले. 

  अमेरिकेत आमच्या घरापासून मैलभर अंतरावर खास कुत्र्यांसाठी तयार केलेले एक डॉगपार्क आहे. या भागातले श्वानप्रेमी लोक आपापल्या पाळीव कुत्र्यांना घेऊन इथे येतात. २५ पाउंडपेक्षा कमी वजन असलेल्या आणि २५ पाउंडांहून जास्त वजन असलेल्या कुत्र्यांसाठी असे त्यात दोन वेगवेगळे भाग केलेले आहेत, पण ते मार्गदर्शनासाठी. इथे कुणीच प्रत्यक्ष वजन मोजून ते ठरवणारा सेवक असत नाही. कुत्र्याच्या मालकाने (किंवा मालकिणीने) आपल्या कुत्र्याच्या हितासाठी त्याला योग्य त्या विभागात न्यावे. तिथे ते कुत्रे इतर मित्रांबरोबर मनसोक्त बागडतात. इथे कुंपणाच्या आत कुत्र्यांना मोकळे सोडले असले तरी त्याच्या मालकाने हजर राहून त्याच्यावर नजर ठेवणे आवश्यक असते. इथे यायला कुत्र्यांना तर खूपच मजा वाटते, पण मालकमालकिणींच्याही ओळखी वाढतात आणि त्यांचे सोशल ग्रुप्स तयार होतात. मग ते इतर ठिकाणी कुत्र्यांशिवायही एकत्र जमून काही धमाल करतात.

आमच्या मायलोला या डॉग पार्कचे विलक्षण आकर्षण आहे. आम्ही त्याला रोजच त्याच्या उद्यानात घेऊन जात होतो आणि अर्धापाऊण तास तिथे ठेवत होतो. तिथे रोज येणारे त्याचे काही मित्रमैत्रिणी भेटले की ते सगळे आपापसात छान खेळत रहायचे. कसे कुणास ठाऊक पण त्याला संध्याकाळ झाली हे कळायचे आणि तो मागच्या दोन पायावर उभा राहून नाचत नाचत पुढच्या दोन पायांनी आम्हाला हलवायचा. "फिरायला जायचं" , "डॉग पार्क" हे शब्द कानावर पडले की त्याच्या अंगात उत्साह संचारायचा आणि मग तो आम्हाला जागेवर बसू द्यायचा नाही.  


पॅटरसन ग्रेट फॉल्स
नायगरा धबधब्याला इतकी प्रचंड जागतिक प्रसिद्धी मिळाली आहे की न्यूजर्सीमध्ये पॅसाइक नावाची एक नदी आहे आणि तिच्यावरही एक धबधबा आहे हे सहसा कुणाला ऐकूनही ठाऊक नसते. या धबधब्याला चक्क 'ग्रेट फॉल्स' असे नाव दिले आहे म्हणून आम्ही तो पहायला गेलो. हा धबधबा ७७ फूट उंचीचा आहे. तसा भेडाघाटचा धबधबाही यापेक्षा फार उंच नसेल, पण नर्मदा नदीचे विशाल पात्र कित्येक पटीने मोठे आहे आणि पाण्याला वेगही आहे त्यामुळे तो धुवाँधार दिसतो. इथली पॅसाइक नदीही लहानशी आणि उंचीही जास्त नाही त्यामुळे या धबधब्यात ग्रेट वाटण्यासारखे काही नव्हते. हा धबधबा जवळून पाहण्यासाठी त्याच्या समोरच एक पूल बांधला आहे, पण तो जुना होऊन असुरक्षित झाला असल्यामुळे त्या पुलावर जायला प्रतिबंध केला आहे. म्हणून आम्हाला जरा दुरूनच त्या धबधब्याचे दर्शन घ्यावे लागले. 

या धबधब्याच्या स्थळाचा इतिहास मात्र महान आहे. इथे सन १७९१ मध्ये Society for Establishing Useful Manufactures या नावाची एक कंपनी सुरू झाली आणि तिने या धबधब्याच्या पाण्याच्या ऊर्जेचा उपयोग करून त्यावर चालणारी यंत्रे बसवली. एडिसन आणि टेसला यांच्याही खूप वर्षे आधीच्या त्या काळात वीजनिर्मिती माहीत नव्हती अशा काळात या जागी पाणचक्कीवर चालणारी पिठाची गिरणी, कापडाची गिरणी, लोखंडाचे सामान किंवा यंत्रे तयार करणारे कारखाने असे उद्योग सुरू झाले होते. त्यांनी एका प्रकारे अमेरिकेच्या औद्योगीकरणाचा पाया घातला असे म्हणता येईल.   आता तिथे काहीच तयार होत नाही, पण स्मारक म्हणून ती जुनी इमारत जपून ठेवली आहे. याच्या बाजूला वसवलेले पॅटरसन हे गावसुद्धा ऐतिहासिक वाटते. तिथेही शंभर दोनशे वर्षे किंवा त्याहूनही जास्त जुन्यापुराण्या कित्येक वास्तू दिसल्या. 


मी अमेरिकेत असतांना आषाढी एकादशी आली होती. आमच्या न्यूजर्सीमधल्या घरापासून पन्नाससाठ किलोमीटर्सवर राहणारे श्री.भाऊसाहेब कुलकर्णी यांनी त्याच्या बंगल्याच्या आवारातच एका शेडमध्ये विठोबारखुमाईच्या मूर्तींची स्थापना करून एक लहानसे पूजा आणि प्रार्थनास्थळ बनवले आहे, त्याचा लोकार्पणसमारंभ आयोजित केला होता आणि ओळखीच्या मराठी मंडळींना आमंत्रण दिले होते. संध्याकाळी आम्ही सगळे त्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे सुमारे दीडशे लोक आले होते. आधी त्यांनी एका पालखीत पादुका ठेऊन त्याची अर्धा तास दिंडी काढली, ती परत आल्यानंतर महिलांनी फुगड्या घालून तिचे स्वागत केले. त्यानंतर आरत्या, विष्णूसहस्त्रनाम आणि हौशी गायकांची भक्तिगीते झाली. सर्व उपस्थित भाविकांसाठी उपवासाचा भरपूर फराळ दिला. अशा प्रकारे माझी आषाढी एकादशी सुफळ संपूर्ण झाली, तीही परदेशात! 


आषाढी एकादशीला पंढरीच्या कानडा राजाच्या भक्तिरसात न्हाऊन निघाल्यानंतर दुसरे दिवशी संध्याकाळी मला एका कॅराओकेवरील गीतांच्या मेहफिलीला हजर राहण्याची संधी मिळाली. याच भागात राहणाऱ्या या उत्साही भारतीय वंशाच्या मंडळींना हिंदी सिनेमातल्या गाण्यांची मनापासून आवड आहे. ते दर महिन्यात आळीपाळीने कुणाच्या घरी जमून संगीतसंध्या साजरी करतात. या महिन्यातल्या कार्यक्रमाची थीम होती डिस्कोम्यूजिक. दोनअडीच तास उडत्या चालीवरची गाणी आणि त्याबरोबर जोरजोरात वाजणाऱ्या वाद्यांचा गलबलाट यावर सगळ्यांनी यथेच्छ गाऊन आणि नाचून घेतले. नंतर मस्त शाही खाणेही होतेच.



माझा जन्म आणि सगळे लहानपण लहान गावातल्या बैठ्या घरात गेले. पुढे आयुष्यभर मी मुंबईपुण्यातल्या उंच इमारतींमध्ये हवेतच असलेल्या फ्लॅटमधल्या बंद दरवाजांच्या संस्कृतीत राहिलो.  मी अमेरिकेत गेलो तेंव्हा साठ वर्षांनंतर पुन्हा एकदा तळमजल्यावर रहायला गेलो. पण तिथले शेजारी जरा अलिप्त रहातात आणि त्यांचे  सहजासहजी एकमेकांकडे जाणे येणे नसते. मात्र आमच्या घराच्या आजूबाजूला वनस्पती आणि प्राणी, पक्षी वगैरे इतर जीव खूप मोठ्या संख्येने पहायला मिळतात. काही मोठे वृक्ष तर इथे मनुष्यवस्ती होण्याच्या आधीपासून इथे उभे आहेत तर काही झाडे पूर्वी राहून गेलेल्या रहिवाशांनी लावलेली आहेत, त्यात आम्ही थोडीशी भर घातली आहे. पडवीत येऊन बसलो तरी आजूबाजूच्या झाडांवरून पक्ष्यांची किलबिल सतत ऐकू येते, मधूनच एकादा पक्षी उडत उडत समोर येऊन नाचतो किंवा भुर्रकन उडून विजेच्या तारेवर जाऊन बसतो. चिमुकल्या खारोट्या  झाडांवर सूरपारंब्यांचा खेळ खेळत असतात. भारतात असतांना मी जास्वंदीची मुख्यतः लालचुटुक फुले पाहिली होती. इथे हिबिस्कस नावाने ती अनेक छटांमध्ये आणि मोठ्या संख्येने पहायला मिळत आहेत. अमेरिकेतल्या निसर्गाच्या सहवासात मी रमून गेलो होतो. त्याच्या आठवणी स्वतंत्र लेखामध्ये देणार आहे.

मी अमेरिकेत असतांना १५ ऑगस्ट होऊन गेला. त्या निमित्याने अमेरिकेतल्या भारतीयांनी भव्य शोभायात्रा काढल्या होत्या. मी त्या पहायला गेलो होतो. एडिसनची कार्यशाळा आणि प्रिन्सटन युनिव्हर्सिटीला भेटी दिल्या. त्या विषयांवरही स्वतंत्र लेख लिहिणार आहे. एकंदरीत पाहता माझा चार महिन्यांचा न्यूजर्सीमधला मुक्काम मजेत गेला. 


Monday, May 06, 2024

हिंदी भजने आणि मराठी गीते

 निर्माता दिग्दर्शक राजा परांजपे यांनी जगाच्या पाठीवर नावाचा एक अफलातून चित्रपट दिला. त्यातली प्रमुख भूमिकाही त्यांनी स्वतः वठवली होती, पण ती एक उमदा आणि सुस्वरूप नायक म्हणून नव्हती. त्यांनी या सिनेमात एका दीन दुबळ्या सरळमार्गी माणसाच्या जीवनाची वाताहत होतांना  दाखवली होती. हा चित्रपट वेगळ्या कथेपेक्षाही त्यातल्या अनेक अप्रतिम गाण्यांमुळे खूप गाजला आणि आता सिनेमा विस्मरणात गेला असला तरी ती गाणी आजतागायत लोकप्रिय आहेत. त्यातली तीन गाणी एक अंध मुलगी रस्त्यात गात गात नाच करते. सीमाने ते काम छान केले आहे. पण रस्त्यात गायलेली ती तीनही गाणी आध्यात्मिक स्वरूपाची गाणी आहेत हे जरा आश्चर्यजनक वाटते. ग.दि.माडगूळकर हे या सिनेमाचे पटकथाकार आणि गीतकार असल्यामुळे त्यांनी ती गीते त्या गोष्टीत चपखलपणे बसवली आहेत. ती गाणी म्हणजे इतकी उत्कृष्ट काव्ये आहेत की त्यासाठी गदिमांच्या प्रतिभेला दाद द्यावीच लागेल.

पुढे मी जेंव्हा काही जुनी हिंदी भजने ऐकली तेंव्हा मला या गीतांची आठवण झाली. अशी मूळ हिंदी भजने आणि त्यावर गदिमांनी लिहिलेली मराठी गीते मी इथे देत आहे. 


१. सूरदासांचे भजन

अब मैं नाच्यौ बहुत गुपाल। . 

काम-क्रोध कौ पहिरि चोलना, कंठ बिषय की माल॥ 

महामोह के नूपुर बाजत, चलत असंगत चाल॥ 

भ्रम-भोयौ मन भयौ, पखावज, चलत असंगत चाल॥ 

तृष्ना नाद करति घट भीतर, नाना बिधि दै ताल। 

माया कौ कटि फेंटा बाँध्यौ, लोभ-तिलक दियौ भाल॥ 

कोटिक कला काछि दिखाराई जल-थल सुधि नहिं काल। 

सूरदास की सबै अविद्या दूरि करौ नँदलाल॥ 

हे गोपाल! अब मैं बहुत नाच चुका। काम और क्रोध का जामा पहनकर, विषयों की माला गले में डालकर, महामोह-ग्रस्त होने से निंदा करने में ही मुझे सुख मिलता है। मै नाचता रहा। भ्रम से भ्रमित मन ही पखावज (मृदंग) बना। कुसंगरूपी चाल मैं चलता हूँ। अनेक प्रकार के ताल देती हुई तृष्णा हृदय के भीतर नाद कर रही है। कमर में माया का फेटा बाँध रखा है ओर ललाट पर लोभ का तिलक लगा लिया है। जल-थल में स्वांग धारण कर कितने समय से (यह तो मुझे स्मरण नहीं) करोड़ों कलाएँ मैंने भली प्रकार दिखलाई हैं। हे नंदलाल! अब तो सूरदास का सारा अज्ञान दूर कर दो।

गदिमांचे गीत :

नाच नाचुनी अती मी दमले

थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला

निलाजरेपण कटीस नेसले, निसुगपणाचा शेला

आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला

उपभोगाच्या शतकमलांची कंठी घातली माला

थकले रे नंदलाला

विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला

अनय अनीती नुपूर पायी, कुसंगती करताला

लोभ प्रलोभन नाणी फेकी मजवर आला गेला

थकले रे नंदलाला

स्वतःभोवती घेता गिरक्या अंधपणा की आला

तालाचा मज तोल कळेना, सादही गोठून गेला

अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला

थकले रे नंदलाला

-----

२. संत मीराबाईचे भजन

माई री! मैं तो लियो गोविंदो मोल।

कोई कहै छानै, कोई कहै छुपकै, लियो री बजंता ढोल।

कोई कहै मुहंघो, कोई कहै सुहंगो, लियो री तराजू तोल।

कोई कहै कारो, कोई कहै गोरो, लियो री अमोलिक मोल।

या ही कूं सब जाणत है, लियो री आँखी खोल।

मीरा कूं प्रभु दरसण दीज्‍यो, पूरब जनम को कोल।


गदिमांनी लिहिलेले गीत

नाहि खर्चिली कवडीदमडी, नाहि वेचला दाम

विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम !

कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी

जन्मभरीच्या श्वासाइतुके मोजियले हरिनाम !

बाई मी विकत घेतला श्याम !

बाळ गुराखी यमुनेवरचा, गुलाम काळा संतांघरचा

हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम !

बाई मी विकत घेतला श्याम !

जितुके मालक, तितुकी नावे, हृदये तितुकी, याची गावे

कुणि न ओळखी तरिही याला दीन अनाथ अनाम !

बाई मी विकत घेतला श्याम !

-----

३. सूरदासांचे भजन 

श्रीकृष्ण गोकुळ सोडून मथुरेला जातो आणि तिकडेच राहतो. त्याची वाट पहात बसलेल्या प्रिय गोपींची समजूत घालण्यासाठी तो उद्धवाला वृंदावनाला पाठवतो. श्रीकृष्णाला दोष न देता आपल्या नशीबाला दोष देत त्या गोपी असे म्हणतात,

ऊधौ, कर्मन की गति न्यारी।

सब नदियाँ जल भरि-भरि रहियाँ सागर केहि बिध खारी॥

उज्ज्वल पंख दिये बगुला को कोयल केहि गुन कारी॥

सुन्दर नयन मृगा को दीन्हे बन-बन फिरत उजारी॥

मूरख-मूरख राजे कीन्हे पंडित फिरत भिखारी॥

सूर श्याम मिलने की आसा छिन-छिन बीतत भारी॥

भावार्थ :- गोपियाँ भगवान कृष्ण के प्रति अपने प्रेम के प्रतिदानस्वरूप विरह को प्राप्त करती हैं। लेकिन वे इसे विधि का विधान कहकर आश्वस्त रहती हैं। वे ऊधो से कहती हैं कि हे ऊधो, प्रकृति का नियम एकदम उलटा है। धरती पर जितनी भी नदियाँ हैं वे सब की सब अपना मीठा जल सागर में डाल रही हैं लेकिन वह फिर भी खारा ही है। छद्म-तपस्वी बगुले को उसने सफेद रंग दिया है जबकि मीठा बोलने वाली कोयल को काला बना दिया। सुन्दर नेत्रों वाला हिरन जंगल में मारा-मारा फिरता है। अनपढ़ लोग धन से खेलते हैं जबकि ज्ञानी लोग अपना जीवन भीख माँगकर पूरा करते हैं। सूरदास कहते हैं कि गोपियों ने कहा--इसी तरह श्याम से मिलने की हमारी इच्छा जितनी बढ़ती जाती है, उतना ही यह वियोग हमें भारी प्रतीत होता है।

याला थोडीशी वर्तमानकाळाची जोड देत ग.दि.माडगूळकरांनी असे गीत लिहिले आहे. या गीतात त्यांनी वेगळी उदाहरणे दिली असली तरी मुख्य मुद्दा तोच ठेवला आहे.

उद्धवा, अजब तुझे सरकार !

लहरी राजा, प्रजा आंधळी अधांतरी दरबार !

इथे फुलांना मरण जन्मता

दगडाला पण चिरंजीविता

बोरिबाभळी उगाच जगती चंदनमाथि कुठार !

लबाड जोडिति इमले माड्या

गुणवंतांना मात्र झोपड्या

पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार !

वाइट तितुके इथे पोसले

भलेपणाचे भाग्य नासले

या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार !

ग.दि.माडगूळकर

चित्रपट - जगाच्या पाठीवर

---

"उधो करमनकी गति न्यारी" याच सूरदासाच्या  भजनाचे तंतोतंत रूपांतर कवयित्री शांता शेळके यांनी असे केले आहे.

दैव किती अविचारी

उधो ! जीवनगति ही न्यारी

शुभ्रवर्ण बगळ्यास दिला तू

कोकिळतनू अंधारी;

कृष्णलोचन सुंदर हरिणे

वनि वनि भ्रमति बिचारी

मूर्ख भोगितो राजवैभवा

पंडित फिरत भिकारी

सूरदास विनवितो प्रभूला

क्षण क्षण हो जड भारी

गीत - शान्‍ता शेळके

संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी

स्वर - रामदास कामत

नाटक - हे बंध रेशमाचे

गीत प्रकार - नाट्यसंगीत

-----

जगाच्या पाठीवर हा चित्रपट आला होता त्या साठ वर्षांपूर्वीच्या काळात उद्धव नावाचा कोणी पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री नव्हता आणि इतिहासात किंवा पुराणातही उद्धव नावाचा कोणी राजा नाही. मग माडगूळकरांनी "उद्धवा अजब तुझे सरकार" असे शब्द का लिहावेत? हे मला गूढच वाटले होते. नंतर ते सूरदासांच्या भजनावरून उलगडले. 

 उद्धव आणि अक्रूर नावाची मथुरेतली दोन महत्वाची पात्रे भागवतपुराणात आहेत. यातल्या अक्रूराने फक्त कृष्णाला गोकुळातून मथुरेला नेण्याचे काम केले. उद्धव कृष्णाचा सखा म्हणून जन्मभर त्याच्यासोबत राहिला.  शेवटी अवतार समाप्त करण्याच्या आधी श्रीकृष्णाने उद्धवाला केलेला उपदेश उद्धवगीता या नावाने ओळखला जातो. त्यानंतर फक्त उद्धवाचा निरोप घेऊन श्रीकृष्ण अरण्यात गेला. मग पुन्हा एकदा उद्धवाने कृष्णाचा निरोप त्याच्या प्रियजनांना सांगितला अशी कथा आहे.  मध्वमुनीश्वर या जुन्या काळातल्या संतांची एक रचना माझ्या लहानपणी लोकप्रिय होती. माझ्या आईच्या काळातल्या बायका हे गाणे म्हणत असत. या गाण्यात श्रीकृष्णाने उद्धवाची काकुळतीने विनवणी केली आहे.

उद्धवा शांतवन कर जा त्या गोकुळवासि जनांचें ॥ध्रु०॥

बा नंद यशोदा माता मजसाठीं त्यजितिल प्राण । 

सांडुनी प्रपंचा फिरती मनिं उदास रानोरान । 

अन्नपाणी त्यजिलें रडती अति दुःखित झाले दीन । 

(चाल बदल) जन्मलों तैंहुनि झटले । 

कटि खांदे वाहतां घटले ।

 मजलागीं तिळतिळ तुटले । 

आटलें रक्त देहाचें ॥१॥

आईबाप त्यजुनी बाळें मजसंगें खेळत होतीं । 

गोडशा शिदोर्‍या आणुनी आवडीनें मजला देती । 

रात्रंदिस फिरले मागें दधि गोरस चोरूं येती । 

(चाल बदल) मी तोडुनि आलों तटका । 

तो जिवा लागला चटका । 

मजविण त्या युगसम घटका । 

आठवतें प्रेम तयांचें ॥२॥

पतिसुतादि गृहधन त्यजिलें मजवरती धरुनी ममता । 

मानिलें तुच्छ अपवर्गा मजसंगें निश्चळ रमतां । 

मद्दत्तचित्त त्या गोपी नेत्रांतरिं लेवुनि समता । 

(चाल बदल) तिळतुल्य नाहिं मनिं डगल्या । 

दृढ निश्चय धरुनी तगल्या । 

बहुधा त्या नसतील जगल्या । 

भंगले मनोरथ ज्यांचे ॥३॥

हरि आहे सुखरूप म्हणुनी भेटतांचि त्या सांगावें । 

सांग कीं समस्ता पुसिलें प्रत्युत्तर त्या मागावें । 

कथुनिया ज्ञान तयातें सांग कीं शोक त्यजावें । 

(चाल बदल) हें कार्य नव्हे तुजजोगें । 

मजसाठीं जावें वेगें । 

हे मध्वमुनीश्वर सांगे । 

त्या नपवे ज्ञान जयाचें ॥४॥

-----


Sunday, January 14, 2024

अमेरिकेतली देवळे

 अमेरिकेत आता भारतीय लोकांची बरीच वस्ती झाली आहे आणि ते सगळे सुखवस्तू लोक आहेत. त्यांनी जागोजागी सुंदर मंदिरे बांधली आहेत. त्यांच्या गुणवत्तेत तसेच संख्येमध्ये सतत वाढ होत आहे. भारतातून अमेरिकेत फिरायला गेलेल्या लोकांना तर त्यांचे अप्रूप वाटते. ही सगळी देवळे गेल्या काही दशकांमध्येच बांधलेली असल्यामुळे त्यांना पौराणिक स्थानमहात्म्य नाही आणि अजूनतरी ती जागृत देवस्थाने झालेली नाहीत. त्यामुळे नवससायास करणाऱ्या भाविक लोकांना त्यांची ओढ नाही. सुटीच्या दिवशी किंवा विशिष्ट धार्मिक महत्वाच्या तिथींना थोडी जास्त गर्दी जमते.पण एरवीसुद्धा सगळीकडे माफक संख्येने भक्तजन दिसतात. काही देवळे वास्तुशिल्पाच्या दृष्टीने खूप सुंदर असल्यामुळे ती प्रेक्षणीय स्थळेही आहेत. आणखी काही वर्षांनी अमेरिकेतल्या मंदिरांची तीर्थयात्रा करण्याची टूम आणि टूर निघाली तर मला आश्चर्य वाटणार नाही.  मी इंग्लंडमधल्या लीड्स शहरात रहात असतांना तितल्या एकमेव 'हिंदू टेंपल'ला जात असेच, शिवाय बर्मिंगहॅम इथे बांधल्या जात असलेल्या प्रति तिरुपती व्यंकटेशाचे दर्शनसुध्दा घडले. माझी गणना 'भाविकां'त होत नसली तरी सुंदर मंदिरांमधले पवित्र आणि प्रसन्न वातावरण मला मोहित करते. आपोआप माझे पाय देवळांकडे वळतात.


मी पहिल्यांदा अमेरिकेत गेलो तेंव्हा अॅटलांटाजवळील अल्फारेटा या शहरात राहिलो होतो. तिथेही एक दोन लहानशी स्थानिक मंदिरे होतीच, पण अॅटलांटाजवळ लिलबर्न या ठिकाणी गुजराथी लोकांचे एक स्वामीनारायणाचे भव्य मंदिर होते, तसेच दक्षिण भारतीय समाजाचेही एक चांगले मोठे देऊळ होते. स्वामीनारायण मंदिराची इमारत छायाचित्रात बाहेरून जितकी सुबक दिसते त्याहूनही अधिक सुरेख ती आंतून दिसते. प्रत्येक खांबावर आणि छपरावर सुबक आणि रेखीव शिल्पकृती कोरल्या आहेत. त्यावर कलात्मक पध्दतीने टाकलेले प्रकाशाचे झोत रंग बदलत असतात. त्याने त्या शिल्पकृतींना अधिकच उठाव येतो. इंग्लंड अमेरिकेत बहुतेक सगळ्या मंदिरांमध्ये मुख्य देवतेशिवाय इतर अनेक देवांच्या मूर्ती ठेवलेल्या असतात. त्यामुळे सगळ्या भक्तांची सोय केली जाते. इथेही राधाकृष्ण, शिव- पार्वती, गणेश, श्रीराम, सीता आणि हनुमानाच्या मूर्ती आहेत, पण या मंदिरात पारंपरिक हिंदू देवतांपेक्षा स्वामीनारायण संप्रदायातील गुरूंना अधिक महत्व दिलेले दिसते.


माझ्या अमेरिकेच्या दुसऱ्या भेटीत मी लॉसएंजेलिसजवळ टॉरेन्स इथे रहात होतो. तिथे आमच्या घराहून सर्वात जवळ असलेले मंदिर पंचमुखी हनुमानाचे होते. मारुतीचे हे रूप मी तरी प्रथमच पाहिले. या देवळातसुद्धा हनुमानाशिवाय इतर मुख्य देवतांची स्थापना केली आहे. गणेशोत्सव, देवीचे नवरात्र वगैरे उत्सवसुद्धा त्या मंदिरांमध्ये साजरे केले जातात.  हे दक्षिण भारतीय लोकांचे मंदिर असल्यामुळे साग्रसंगीत पूजा, अभिषेक आणि मंत्रपठण वगैरे विधीवत प्रकार तिथे नेहमी चाललेले असतात.  त्या भेटीत मी लेक श्राइन नावाचा परमहंस स्वामी योगानंदांचा रम्य आश्रम पाहिला होता. या आश्रमात सर्वधर्मसमभाव आहे. योगानंदांची शिकवण जगातील सर्व धर्मीयांच्या कल्याणासाठी आहे.


गेल्या वर्षी मी पुन्हा अमेरिकेला गेलो तेंव्हा न्यूजर्सीमधल्या साउथ प्लेनफील्ड नावाच्या लहानशा गावात रहात होतो. तिथल्या रहिवासामध्येसुद्धा मला अनेक देवळांचे आणि देवतांच्या मूर्तींचे दर्शन घडले. तिथे गेल्या गेल्या आम्ही जवळच्या ब्रिजवॉटर इथल्या बालाजी मंदिरात जाऊन आलो. अनादि, अनंत, निर्गुण, निराकार, जगातील कणाकणात भरलेला असे परमेश्वराचे वर्णन असंख्य वेळा ऐकूनसुद्धा त्याच्या देवळात जाऊन त्याच्या मनोहर रूपाचे दर्शन घ्यायला लोकांना अतीशय आवडते. आंध्रप्रदेशातील तिरुपति येथील वेंकटेश किंवा बालाजीचे मंदिर जास्तीत जास्त भक्तगणांच्या गर्दीसाठी प्रसिद्ध आहे. हा भगवान विष्णूचा अवतार आहे अशी श्रद्धा असली तरी "परित्राणाय साधूनाम् विनाशायच दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय" यातल्या कुठल्या कारणासाठी हा अवतार घेतला गेला याची कथा मी कधी ऐकली नाही. 


तिरुपतीचा व्यंकोबा दोन भक्तांना दर्शन देण्यासाठी आमच्या जमखंडीजवळच्या कल्हळ्ळीच्या डोंगरावर अवतरला अशी तिथल्या लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे आम्ही लहानपणापासून त्या देवाचे दर्शन घेण्यासाठी "व्यंकटरमणा गोविंदा" या नामाचा घोष करत तिथे अनेक वेळा जात होतो. आमच्या परिवारातले अनेक लोक मुंबईपुण्याहून त्याच्या दर्शनासाठी जमखंडीला येऊन जात होते, अजूनही जात असतात. त्यांच्या बोलण्यात त्याचा उल्लेख येत असतोच. माझ्या आईने या कल्हळ्ळीचा व्यंकटेशावर कवने रचली होती.  लहानपणापासूनच व्यंकटेश या देवाबद्दल मनात खूप आपुलकी आणि भक्तीभाव होता. आम्ही दक्षिण भारताची सहल आधी तिरुपतीला जाऊन व्यंकोबाचे दर्शन घेऊन सुरू केली होती.


या देवाचे भक्त जगभर पसरलेले आहेत. त्यांनी इतर अनेक ठिकाणी बालाजीची सुंदर मंदिरे बांधली आहेत. पुण्याजवळील केतकावली इथले प्रतितिरुपति देऊळ प्रसिद्ध आहेच, मी तिथेही  दोनदा जाऊन आलो आहे. अमेरिकेतल्या न्यूजर्सीमधील ब्रिजवॉटर नावाच्या गावातसुद्धा एक अत्यंत सुंदर असे वेंकटेशाचे देऊळ आहे आणि अमेरिकेतले भारतीय वंशाचे लोक तिथे दर्शनासाठी येत असतात.  आम्ही या देवळात गेलो तेंव्हा तळमजल्यावर आत जाताच समोरील एका हॉलमध्ये बरीच गर्दी दिसत होती, पण आत जाऊन पाहिल्यावर ते लोक एकाद्या खाजगी धार्मिक कार्यक्रमासाठी जमले होते असे समजले. मुख्य मंदिर वरच्या मजल्यावर होते म्हणून आम्ही जिना चढून वर गेलो. तिथल्या भव्य हॉलमध्ये मधोमध श्रीव्यंकटेशाचे मुख्य मंदिर होते. तिथे आत जाऊन दर्शन घेतले. बाहेर आल्यावर देवळाला प्रदक्षिणा घालण्याच्या वाटेवर श्रीदेवी, भूदेवी, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वति, श्रीराम, श्रीकृष्ण, आंजनेय (मारुती), महागणपति, सुब्रह्मण्यम, नवग्रह इत्यादि सतरा देवतांच्या लहानलहान पण सुबक अशा घुमटी होत्या. मंदिराच्या संपूर्ण परिसरातली स्वच्छता आणि शांतताही वाखाणण्यासारखी होती. अपेक्षेप्रमाणे प्रसादाचा बुंदीचा लाडू मिळालाच. तिरुपतीला, केतकावलीला आणि ब्रिजवॉटरला मिळालेल्या प्रसादाची चंव अगदी एकसारखी होती इतके त्याचे जागतिक प्रमाणावर स्टँडर्डायझेशन झाले आहे.


मी अमेरिकेत असतांना आषाढी एकादशी आली होती. यानिमित्याने त्या भागात राहणाऱ्या काही मराठी मंडळींनी उत्साहाने काही कार्यक्रम केले होते. एका सुटीच्या दिवशी एका लहानशा मैदानात एक प्रतीकात्मक दिंडी काढून पालकीची मिरवणूक काढली होती. त्याला रिंगण असे नाव दिले होते. शंभर सव्वाशे लोक भारतीय पोशाख घालून हातात भरवा झेंडा घेऊन रामकृष्णहरी नामाचा घोष करत नाचत नाचत चालत होते. नंतर श्री.कुलकर्णी नावाच्या एका अमेरिकेतल्या भक्ताच्या घरी एक मोठा कार्यक्रम झाला. त्यांनी आपल्या बंगल्यातल्या एका शेडमध्ये श्रीविठ्ठलरखुमाईचे देऊळ तयार केले आहे. तिथेही आधी एका पालखीत विठोबारखुमाईच्या मूर्ती ठेऊन चाळीसपन्नास भक्तांनी त्याची मिरवणूक काढली आणि अमेरिकेतले रहदारीचे सगळे नियम पाळून तिला फूटपाथवरूनच मैलभर फिरवून आणले. त्यानंतर प्रवचन, भजन, भक्तीसंगीत वगैरेंचा सुरेल कार्यक्रम झाला, त्यालाही शंभरावर लोक आले होते.  ते आजूबाजूच्या शंभर मैलांच्या परिसरातून आले होते.



माझी भारतात परतायची वेळ आली त्या सुमाराला असे कळले की न्यूजर्सीमध्येच भारताबाहेरील सर्वात मोठे असे अक्षरधाम मंदिर बांधले जात होते. त्याचे औपचारिक उद्घाटन ऑक्टोबरमध्ये होणार होते, पण त्याआधीच ते पाहून घ्यावे असा विचार करून आम्ही कारने रॉबिन्सविले या गावी त्या मंदिराच्या प्रांगणापर्यंत जाऊन पोचलो. तिथे पार्किंग लॉटमध्ये शेकडो मोटारी दिसत होत्या आणि आतमध्येही शेकडो लोक  फिरतांना दिसत होते. पण आम्हाला गेटपाशीच अडवले आणि फक्त पासधारकांनाच प्रवेश आहे असे सांगितले. हे पास आधीपासून ऑनलाइन बुकिंग करून मिळवले जात होते आणि आयत्या वेळी आलेल्या लोकांना तिथल्या तिथे काही शुल्क आकारून पास देण्याची काही व्यवस्थाच नव्हती. तिथे कडक पोलिसबंदोबस्त होता आणि गळ्यात पास धारण न केलेला कोणी इसम दिसल्यास स्थानिक अमेरिकन पोलिस आयोजकांवरच कडक कारवाई करणार असा धाक घातला होता. त्यामुळे अगदी काकुळतीने विनवण्या करूनसुद्धा आम्हाल प्रवेश मिळालाच नाही. अखेर मंदिराचे दुरूनच शिखरदर्शन करून घरी परत जावे लागले.