Monday, March 23, 2026

उतारवयातले विकार

 




आमच्या शाळेच्या पुस्तकात शारदा या नाटकातले एक गीत होते, "म्हातारा इतुका न अवघे पाउणशे वयमान ।" त्याची शारीरिक अवस्था कशी होती?

दंताजीचें ठाणें उठलें, फुटले दोन्ही कान ।

डोळे रुसले कांहिं न बघती नन्‍ना म्हणते मान ॥

तुरळक कोठें केस रुपेरी, डोइस टक्कल छान ।

भार वयाचा वाहुनि वाहुनि कंबर होय कमान ॥

काठीवाचुनि नेट न पाया परि मोठे अवसान ।

त्या वेळेला आम्ही हे एक विनोदी गाणे समजून छान हावभाव करून म्हणत होतो आणि खदाखदा हसत होतो. पण अशी सत्य परिस्थिती किती उदास असते याची तेंव्हा आम्हाला कल्पना नव्हती.

जिथे कुठलीही अप्रिय गोष्ट नजरेलाही पडणार नाही अशा राजवाड्यात युवराज सिद्धार्थाला वाढवले होते. पण एक दिवस तो राजवाड्याच्या बाहेर पडला तेंव्हा रस्त्यात त्याला एक जख्ख म्हातारा दिसला. हा माणूस असा का वाकलेला दिसतो असे सारथ्याला विचारल्यावर त्याला उत्तर मिळाले की सगळीच माणसे अखेर म्हातारी होतात. याशिवाय त्याला एक आजारी माणूस आणि एक प्रेत दिसले. या अवस्थासुद्धा सगळ्यांच्याच आयुष्यात येतात हे ऐकून सिद्धार्थाला एवढा मोठा धक्का बसला की तो संसारातून विरक्त होऊन तपश्चर्या करायला गेला आणि मानवी जीवनामधील दुःखांवर उपाय शोधण्यावर विचार करत गौतमबुद्ध झाला.

. . . . .

माझ्या लहानपणी घरात कुणालाही लहानसहान किरकोळ दुखणे झाले तर त्यावर घरगुती उपचारच केले जात असत, काही गंभीर आजार असला तरच फॅमिली डॉक्टरांना बोलावले जायचे. हे डॉक्टर घरी येऊन थर्मॉमीटरने आजारी माणसाचे टेंपरेचर पहायचे आणि स्टेथास्कोपने त्याची छाती तपासायचे, त्याशिवाय त्याची नाडी, जीभ आणि डोळ्यातली बुबुळे पहात असत, कधीकधी पोट दाबून पहात असत. कदाचित त्यांच्या दवाखान्यात रक्तदाब पहाण्याचे साधन असेलही, पण मी ते कधी पाहिले नव्हते. आमच्या लहान गावात रक्त तपासणी करण्याची सोय नव्हती आणि वाहतुकीची सोयिस्कर साधनेही नव्हती त्यामुळे फक्त तेवढ्यासाठी निदान आमच्या घरातून तरी कोणीही कधीच बेळगाव किंवा मिरजेला हॉस्पिटलमध्ये गेला नव्हता. माझी आई किंवा वडील यांनी कधी रक्तातली साखर किंवा रक्तदाब तपासला होता की नव्हता हेच मला माहीत नाही. "त्यांना हे विकार होते का?" असे डॉक्टर मला विचारतात तेंव्हा मला नाही असेच सांगावे लागते कारण त्यांना यातले काही असते असे समजले असते आणि त्यावर ते रोज काही औषधे घेत असते तर त्याची घरात नक्कीच थोडी तरी चर्चा झाली असती. त्या काळात लहान गावांमध्ये या तपासण्याच केल्या जात नसत म्हणूनही लोक त्याविषयीच्या अज्ञानाचे सुख अनुभवत असतील. आज निम्म्याहून जास्त वयस्कर लोकांना यातले काहीतरी किंवा दोन्ही विकार हमखास असतात.

पूर्वीच्या काळी सरकारी नोकरीतून पंचावन्न वर्षाला रिटायर करत असत आणि बहुतेक पेन्शनर त्यानंतर फार तर पाच दहा वर्षेच पेनशन घेत असत. मध्यमवर्गातल्या माणसाच्या सगळ्या मुलांची लग्ने झाली आणि एक दोन नातवंडे घरात आली की त्याचे इथले काम संपले, आता त्याने जायला हरकत नाही असे समजले जात असे. साठपासष्ट वर्षांपर्यंत हे साधले जात असे. त्यानंतर तो कधी तरी गेला तर त्याचे 'सोने झाले' असेच म्हंटले जात असे. त्यामुळे 'अवघे पाउणशे वयमान' असलेला गाण्यातल्यासारखा गलितगात्र किंवा खरा टुणटुणित असाही मागच्या पिढीमधला कुठला म्हातारा माणूस माझ्या लहानपणी मला जवळून पहायला मिळाला नाही. त्यावेळी मोठ्या लोकांना त्यांचे वय विचारणे अशिष्ट मानले जात होते, पण मला असे वाटते की त्या काळात माझ्या आजूबाजूला दिसणारी सगळी वयस्कर माणसे सत्तरीच्या आतलीच असावीत. 

माझ्या लहानपणी म्हणजे सुमारे साठसत्तर वर्षांपूर्वीच्या काळात वयस्कर समजली जाणारी जी कोणी साठपासष्ठ वयाची माणसे मी पाहिली होती त्यातल्या बहुतेक लोकांचेही केस थोडे फार पांढरे झालेले असायचे आणि ते लोक त्यावर कलप लावून ते झाकायचा प्रयत्नही करत नसत. अनेक लोकांना पूर्ण किंवा अर्धवट टक्कल पडले असायचे, पण त्या काळातले लोक नेहमी घराबाहेर जातांना डोक्यावर टोपी किंवा फेटा घालत असत, त्यात ते झाकून जात असे.  चेहेऱ्यावर किंवा हातापायांच्या त्वचेवर सुरकुत्या पडणे हे तर वार्धक्याचे एक मुख्य लक्षण असते. लहान मूलसुद्धा त्यावरूनच पटकन कुणाला आजोबा किंवा आजी म्हणते. त्वचेवरील सुरकुत्या, केस पिकणे किंवा गळणे याला आजार म्हणता येणार नाही. ती नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यावर काही इलाजही नसतो. बहुतेक लोकांचे दात पडायला सुरुवात झालेली असे, त्यामुळे  त्यांना अन्न चावायला त्रास होत असे. काही लोकांची भूक मंदावलेली असे म्हणून ते मिताहारी होत असत, काही लोक रात्री जेवण न घेता थोडा हलकाफुलका अल्पोपहार घेत असत. आमच्या सगळ्या गावात मिळून फक्त दोनतीन व्यक्तीच कंबरेमध्ये वाकल्या होत्या आणि काठीच्या आधाराने हळू हळू एक एक पाऊल टाकून चालत असत. त्या कदाचित सत्तरऐंशीच्या पुढे गेल्या असतील. पण आधीच्या पिढीमध्ये हातात एक काठी घेऊन तिला गरगर फिरवत चालण्याची एक फॅशनसुद्धा होती. त्यामुळे काही धडधाकट लोकांच्या हातातही काठी असायची. काही वयस्क लोकांचे गुढगे दुखत असत, तर काही लोकांच्या पायाचे तळवे दुखत असत आणि ते लोक घरी आल्यावर पाय चेपून घेत असत. बहुतेक नाटकसिनेमांमधले वृद्ध लोक नेहमी खोकतांना दाखवले जातात, त्याप्रमाणे काही लोकांना दमाखोकल्याचा त्रास वरचेवर होत असे. वयाच्या चाळिशीनंतरच बहुतेक लोकांना वाचण्यासाठी भिंगाची गरज पडत असे, क्वचित काही लोकांच्या डोळ्यात मोतीबिंदू होऊन  त्यामुळे त्यांची दृष्टी अधू झालेली असे. त्यात कृत्रिम भिंग बसवून पूर्ववत दृष्टी मिळण्याची सोय त्या काळात नव्हती. मला असे आठवते की त्या काळात काहीसे विक्षिप्त, हेकट, तऱ्हेवाइक, मनाचे संतुलन बिघडलेले, स्वतःशीच बडबड करणारे असे म्हातारे लोक जास्त प्रमाणात दिसायचे. आजच्या जगातही तशा प्रकारचे लोक असतात, पण कदाचित त्यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला असेल.

आमच्या घरातली कुणीही वडिलधारी व्यक्ती रोज सकाळसंध्याकाळी एखादी गोळी घेत नव्हती. कुणाला ताप आला, खोकला झाला तर त्याने दोनचार दिवस औषधे घेतली आणि तो आजार बरा झाल्यावर ते बंद केले हे ठीक आहे, पण धडधाकट दिसत असलेल्या माणसाने रोज उठून कुठले तरी औषध घेणे ही पूर्वी माझ्या कल्पनेच्या पलीकडली गोष्ट होती. मी नोकरीसाठी मुंबईला आल्यानंतर इथे ज्या लोकांच्या ओळखी होत गेल्या त्यात काही लोक रोज अशी औषधे घेतांना दिसले. वयस्कर लोकांमध्ये त्यांचे प्रमाण जास्त होते. त्यातले बहुतेक लोक रक्तदाब किंवा रक्तामधील साखरेचे प्रमाण नियंत्रणामध्ये रहावे या कारणासाठी वर्षानुवर्षे औषधे घेत राहिले होते, आता त्यांचे प्रमाण जास्त वाढले आहे. 

या दोन्ही अशा गोष्टी आहेत की त्यांचे प्रमाण हळूहळू थोडे थोडे वाढले तर ते माणसाला आपोआप जाणवत नाही. आपल्या ज्ञानेंद्रियांमध्ये तशी क्षमता नाही. काही तात्कालिक कारणामुळे त्यात तात्पुरती वाढ झाली तर ते कारण संपल्यावर आपले शरीरच त्यांना पुन्हा नियंत्रणाखाली आणत असते. शरीररचनेमधली ही क्रिया खरोखर अद्भुत अशी आहे. पण जर हे प्रमाण प्रमाणाबाहेर वाढले किंवा दीर्घ काळ वाढलेले राहिले तर त्यांचे वाईट परिणाम होऊन एखादे इंद्रिय काम करेनासे होते किंवा एखादा मोठा आजार उद्भवतो. तसे झाले तर तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते, त्यानंतर तिला नियंत्रणाखाली आणणे अवघड असते. कदाचित यामुळेच पूर्वीच्या काळी अपमृत्यूंचे प्रमाण जास्त असायचे.

शहरांमधले डॉक्टर ही धोक्याची सूचना अधिक परिणामकारक पद्धतीने देतात. सामाजिक माध्यमांवरही यावर अनेक लेख आणि सूचना सारख्या येत असतात. रक्तदाब आणि रक्तशर्करा या गोष्टी मोजण्याची नवनवी उपकरणे तयार होऊन बाजारात येत गेली आणि त्यांचा उपयोग करून या दोन्हींची प्रमाणे मोजता येणे अधिकाधिक सुकर होत गेले. यामुळे आजकाल त्यांचे प्रमाण वाढायला सुरुवात झाली की लगेच त्यावर उपाययोजना सुरू केल्या जातात. मी सुमारे चाळीस वर्षांचा असतांना पहिल्यांदा रक्ततपासणी करून घेतली होती. त्याच्या आदल्या रात्रीच एका लग्नाच्या मेजवानीला गेलो होतो आणि सगळ्या पक्वान्नांवर यथेच्छ ताव मारला होता. त्याचा परिणाम झाला होता आणि साखरेचे प्रमाण एकदम दोनशेच्या वर गेले होते. पण आमच्या डॉक्टरने काही सूचना दिल्या आणि तीन आठवड्यांनंतर पुन्हा चाचणी केली तर ती शंभराच्या आत आली. त्या डॉक्टरांनी सांगितले होते की यावर नियंत्रण ठेवण्याचे तीन मार्ग असतात, १.आहारावर नियंत्रण, २.व्यायाम आणि ३.औषधोपचार. मी त्यांना सांगितले की मी आहारावर अगदी काटेकोर नियंत्रण ठेवीन आणि मला जमेल तेवढा व्यायाम करेन, पण मला औषध नको. पुढील वीस वर्षे मी नियमितपणे रक्ततपासणी करून घेत होतो आणि माझ्या रक्तामधील साखरेचे प्रमाण कुठल्याही औषधाविनाच नियंत्रणाखाली राहिले होते.

मधुमेह हा तसा फक्त उतारवयातला विकार नाही. कुठल्याही वयाच्या माणसाच्या शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नसेल तर त्याने खाल्लेल्या अन्नाचा रस शरीरामधील पेशींपर्यंत पोचू शकत नाही ही मुख्य व्याधी असते, तिच्यामुळे त्या पेशी योग्य प्रकारे काम करू शकत नाहीत. अन्नरसातली साखर पेशींकडून वापरली न गेल्यामुळे ती रक्तामध्ये साठत जाऊन तिचे प्रमाण वाढते. रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण हा या व्याधीचा इंडिकेटर आहे, रोग नाही. सुदृढ माणूस जेवढे अन्न खातो त्याचे पचन होऊन तो अन्नरस त्याच्या शरीराला रक्तामधून मिळत असतो. तो दिवसभरात जेवढी मेहनत करत असतो त्यासाठी लागणारी ऊर्जा तयार करण्यात तो अन्नरस खर्च होऊन जातो आणि रक्तातील साखरेचे प्रमाण आपणहून आटोक्यात राहते. आपण दिवसातून दोन तीन वेळाच अन्न खातो, पण शरीरामधल्या पेशी चोवीस तास काम करत असतात. त्यांना सतत अन्नरस पोचवत राहण्यासाठी त्याचा तात्पुरता साठा करून ठेवणे आणि त्यातून तो पुरवत राहणे हे काम आपले शरीर बिनबोभाट करत असते. रोजच गरजेपेक्षा जास्त अन्न खाणाऱ्यांचा अतिरिक्त अन्नरस मेदाच्या स्वरूपात शरीरात ठिकठिकाणी जमा होत राहतो. यामुळे शरीराला चुकीचा संदेश मिळून किंवा अनुवंशिकतेसारख्या इतर काही कारणांमुळे  स्वादुपिंड इन्सुलिनची निर्मिती कमी करायला लागते. यातून मधुमेह उद्भवतो. 

इन्सुलिनची निर्मिती गरजेपेक्षा कमी होत असते तेंव्हा औषधे देऊन ती काही प्रमाणात वाढवली जाते. रक्तातल्या साखरेचे प्रमाण थोडेसेच वाढले असतांना ते लक्षात आले तर ही उपाययोजना त्याला नियंत्रणात आणू शकते. माझ्या माहितीतल्या अनेक लोकांना उतारवयामध्ये याची गरज पडते. कदाचित वयोमानानुसार शरीरातल्या सगळ्याच इंद्रियांची कार्यक्षमता कमी होत असल्यामुळे असेल किंवा शारीरिक श्रम कमी झाल्यामुळे तसे होत असेल. जर औषधे अपेक्षेनुसार काम करत नसतील तर त्या रुग्णाला जेवणाआधी एका लहानशा सुईने इन्सुलिनचे इंजेक्शन दिले जाते. त्याला ते रोज घेत रहावे लागते.  हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झालेल्या पेशंटची रोजच जेवणाआधी रक्ततपासणी करतात आणि साखरेचे प्रमाण जास्त निघाले तर ते लगेच इन्शुलिन देऊन कमी करतात.

मधुमेह बळावला तर त्याचे परिणाम शरीराच्या इतर अवयवांवर होतात. कुणाची दृष्टी मंद होते, तर कुणाचे पाय कमजोर होतात, काही लोकांना झालेली जखम बरी होतच नाही आणि त्यात सेप्टिक होऊन गंभीर समस्या उद्भवतात. आजकाल तपासणी करण्याच्या इतक्या सोयी निघाल्या आहेत त्यातले ग्लुकोमीटर नावाचे एक उपकरण घेतले तर कुठल्याही लॅबोरेटरीमध्ये न जावे लागता घरीच रक्तशर्करा मोजता येते आणि त्याचा रेकॉर्ड ठेवता येतो. नियमितपणे मधुमेहावर उपचार घेत असलेले काही ज्येष्ठ नागरिक हे उपकरण जवळ ठेवतात. आठवडा, पंधरवडा किंवा महिन्यातून एकदा किंवा मनात शंका आली तर लगेच चाचणी करून रक्तातली साखर मोजतात आणि खात्री करून घेतात. त्यांना मधुमेहाचे दुष्परिणाम टाळता येतात.

माणसाचे, तसेच इतर प्राण्यांचे हृदय  शरीरातील सर्व अवयवांना रक्त पोहोचवण्यासाठी एका मध्यवर्ती पंपाप्रमाणे काम करते. जेव्हा ते आकुंचन पावते तेंव्हा ते त्यातले शुद्ध रक्त मोठ्या वेगाने धमन्यांमध्ये (शुद्ध रक्तवाहिनींमध्ये) ढकलते. रक्ताचा हा प्रवाह धमन्यांच्या भिंतींवर एक प्रकारचा दाब निर्माण करतो. यालाच आपण रक्तदाब म्हणतो. या दाबामुळे ते रक्त शरीरभरातल्या सर्व रक्तवाहिन्यांधून सगळीकडे पसरते आणि तिथले अशुद्ध झालेले रक्त हृदयाच्या दुसऱ्या कप्प्यामध्ये परत येते.  तिथून ते फुफ्फुसात जाऊन शुद्ध होऊन हृदयात परत येते आणि तिथून पुन्हा धमन्यांमधून शरीरात पसरते. हे काम एक सेकंदापेक्षा कमी वेळात होत असते अशा प्रकारचे रक्ताभिसरण माणूस जिवंत असेपर्यंत अविरत चाललेले असते. अर्थातच रक्तदाब (Blood Pressure) ही मानवी शरीरातील एक अत्यंत नैसर्गिक आणि आवश्यक प्रक्रिया आहे. रक्तातला हा दाब सतत बदलत असतो. जेंव्हा शुद्ध रक्त हृदयातून धमनीमध्ये ढकलले जाते तेंव्हा तो सर्वात जास्त असतो, त्याला सिस्टोलिक (Systolic - वरचा आकडा) म्हणतात आणि त्यानंतर जेव्हा हृदय शिथिल (Relax) होते, तेंव्हा धमन्यांमध्ये असलेला हा किमान दाब असतो त्याला डायस्टोलिक दाब (Diastolic - खालचा आकडा) म्हणतात. प्रत्येक क्षणी रक्ताचा दाब या दोन आकड्यांमध्ये कमी जास्त होत असतो. याशिवाय माणूस गाढ झोपला असेल, आडवा निजला असेल, उठून बसला असेल किंवा उभा राहिला असेल तरी त्या अवस्थांमध्ये तो बदलतो. तो चालत, धावत किंवा उडी मारत असेल तर तो वाढतो, इतकेच नव्हे पण आनंद, दुःख, भय, आश्चर्याचा धक्का अशा भावनांमुळेसुद्धा तो तात्पुरता वाढतो.

मनगटावरील नाडीवर बोट ठेवले तर आपल्याला रक्तवाहिनीमधील या दाबात होत असलेल्या फरकामुळे मिळत असलेले हलकेसे धक्के जाणवतात, याला ठोके म्हणतात. पूर्वीच्या काळातले वैद्य या नाडीची परीक्षा करून फक्त त्याच्या अनुभवावरून रोगाचे निदान करत असत. शास्त्रज्ञ, डॉक्टर्स आणि इंजिनियर्स या लोकांनी संशोधन करून सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक रक्तदाब मोजण्याचे उपकरण तयार केले. यातून हा दाब  mmHg (Millimeters of Mercury) या युनिटमध्ये मोजला जातो.  त्यासाठी पारा भरलेल्या एका काचेच्या उभ्या नलिकेचा उपयोग केला जात असे. त्या यंत्रावर हा रक्तदाब मोजणे हे चिकाटी आणि कौशल्याचे काम असे. त्यामुळे पूर्वीच्या काळी ते उपकरण फार जास्त वापरले जात नव्हते. पण आता सुटसुटित अशी डिजिटल यंत्रे आली आहेत, त्यामुळे सगळे डॉक्टर आता सरसकट सगळ्या रुग्णांचा आधी रक्तदाब मोजतात, इतकेच नव्हे तर असे यंत्र घरी ठेऊन अनेक लोक स्वतःच आपला रक्तदाब मोजत असतात. त्याला काही कौशल्य लागत नाही, त्यासाठी दोन मिनिटे पुरतात आणि कसलाही खर्चही येत नाही.

हृदयामधून बाहेर ढकललेले रक्त रक्तवाहिन्यांमधूनच  शरीरातल्या सगळ्या अवयवांपर्यंत जाऊन पोचते आणि पुन्हा परत येते. या प्रवाहाला होणाऱ्या विरोधावर मात करेल एवढा दाब निर्माण करणे त्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे  रक्तवाहिन्या (धमन्या) किती अरुंद किंवा रुंद आहेत, यावर रक्तदाबाचे प्रमाण अवलंबून असते. जर धमन्या लवचिक आणि मोकळ्या असतील, तर रक्त सहज वाहते. मात्र त्या काही कारणाने अरुंद झाल्या, तर त्यातून रक्त ढकलण्यासाठी हृदयाला जास्त जोर लावावा लागतो, ज्यामुळे दाब वाढतो. आहारात मीठ, तळलेले पदार्थ आणि जंकफूड जास्त असेल तर रक्तदाब वाढतो,  शारीरिक हालचाल कमी असल्यास वजन वाढते आणि हृदयावर ताण पडतो, सततची चिंता किंवा मानसिक तणावामुळे शरीरात 'कॉर्टिसोल' सारखी संप्रेरके वाढतात, जी रक्तदाब वाढवण्यास कारणीभूत ठरतात. धूम्रपान आणि मद्यपानामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्या कडक होतात, त्यामुळे रक्तदाब वाढतो. जर कुटुंबात आई-वडिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास असेल, तर तो होण्याची शक्यता वाढते. मधुमेह किंवा किडनीशी संबंधित आजार असल्यास रक्तदाब वाढू शकतो. या गोष्टी कुठल्याही वयात होऊ शकतात, पण वयोमानानुसार रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते या कारणाने उतारवयात रक्तदाबाची समस्या जास्त प्रमाणात दिसते.

प्रतिबंधक उपाय म्हणून आहारावर नियंत्रण ठेवणे, नियमित व्यायाम, योगासने आणि प्राणायाम करणे, निर्व्यसनी राहणे, रोज ७-८ तास शांत झोप घेणे वगैरे गोष्टी केल्या तर रक्तदाबाला वाढण्याची कारणे कमी होतील.  छंद जोपासणे, संगीत ऐकणे किंवा ध्यान करणे यांमुळे मानसिक ताण कमी होतो, तसेच जास्त चिकित्सा, वादावादी किंवा चिंता यातून मनस्ताप करून न घेणे आणि मन शांत ठेवणे वगैरे गोष्टी कराव्यात असे सांगितले जाते. त्यांचा निश्चितपणे फायदा होतोच, पण अनुवंशिकता आणि वयोमानाचे परिणाम यावर उपाय नसतो. त्यामुळे वयाच्या एका टप्प्यावर डॉक्टर औषधे घेण्याचा सल्ला देतात.  ती नियमितपणे घेत राहल्यास रक्तदाब पूर्णपणे नियंत्रणाखाली राहतो आणि त्यामुळे होऊ शकणारे इतर आजार किंवा धोके टाळता येतात.

जन्मलेल्या मुलाच्या तोंडात दात नसतात.  काही महिन्यानंतर त्याला पहिला दात येतो आणि २-३ वर्षांपर्यंत सगळे म्हणजे २० दात येतात. त्यांना दुधाचे दात म्हणतात. सहाव्या किंवा सातव्या वर्षांच्या सुमाराला या दातांच्या खाली नवे दात तयार व्हायला लागतात आणि आधीच्या दातांना पाडून त्यांच्या जागी हे नवे दात येतात, बारा तेरा वर्षांपर्यंत २८ दात आले असतात आणि सतरा अठरा वर्षांनंतर चार अक्कलदाढा येऊन दातांची बत्तिशी पूर्ण होते. हे कायमचे दात पन्नास साठ वर्षे तरी सहज टिकून राहतात.

हे दात अतिशय कणखर असतात. पण त्यांची निगा राखली नाही तर त्यांना कीडही लागते. हे इतके शक्तिशाली किडे कुठे तयार होतात आणि ते कसे तोंडात येऊन दातांना खातात? याचे आश्चर्य वाटते. हा किडा कधीच डोळ्यांना दिसतही नाही, पण त्याने दातांना पोखरल्यावर त्याने केलेला प्रताप मात्र दिसतो. आपण खाल्लेल्या अन्नातले  काही कण दातांना चिकटून राहतात. या जगात असंख्य प्रकारचे सूक्ष्मजीव (बॅक्टेरिया) असतात. ते डोळ्यांना दिसत नाहीत, पण गुपचुप काम करत असतात. तोंडात असलेले बॅक्टेरिया या कणांवर जैवरासायनिक प्रक्रिया करतात. या प्रक्रियेतून एक प्रकारचे ॲसिड (आम्ल) तयार होते. हे ॲसिड लाळेसोबत मिसळून दातांवर एक चिकट थर तयार करते, ज्याला 'प्लाक' (Plaque) म्हणतात. बॅक्टेरियाने तयार केलेले ॲसिड हळूहळू दातावरील संरक्षक कवचाला विरघळवून कमकुवत करते आणि त्यात छिद्र पाडते. यालाच आपण 'दात किडणे' किंवा 'कॅव्हिटी' म्हणतो.  ही कीड दातांच्या आतल्या मऊ भागापर्यंत पोहोचते तेंव्हा त्यामुळे सूज येते आणि असह्य अशा वेदना होतात. पूर्वीच्या काळी त्या खळग्यामध्ये चांदी किंवा सोने भरून तो बुजवला जात असे किंवा तो दातच उपटून काढून टाकला जात असे. आजकाल रूट कॅनॉल ट्रीटमेंटने उपचार केले जातात. 

किडणे हा प्रकार कुठल्याही वयात होऊ शकतो पण प्रौढांमध्ये हिरड्यांचे आजार हे दात पडण्याचे सर्वात मोठे कारण असते. जेव्हा दातांवर प्लाक साचते तेंव्हा हिरड्यांना संसर्ग होतो आणि तो हळूहळू दातांना आधार देणाऱ्या हाडापर्यंत  पोहोचतो. यामुळे दात आणि हिरड्यांमधील पकड सैल होते आणि शेवटी दात हलू लागून पडतात. तसेच किडीमुळेही दात आतून पूर्णपणे पोकळ होतो किंवा त्याचे मूळ कुजते, तेव्हा तो दात काढावा लागतो किंवा आपोआप पडतो. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्यास हिरड्यांच्या संसर्गाचा धोका वाढतो, तर ओस्ट्रोपोरोसिसमुळे हाडे कमकुवत होतात यामुळेही दात लवकर पडू शकतात. कधीकधी अपघातामुळे दाताला जबर धक्का बसतो आणि तो पडू शकतो. वय वाढल्यानुसार नैसर्गिकरित्या हिरड्यांची झीज होते. अशा अनेक कारणांनी दातांची पडझड होत राहते. पडलेल्या किंवा उपटून टाकलेल्या दाताच्या जागी नवा दात येत नाही. त्यामुळे उतारवयामध्ये पोचेपर्यंत "दंताजीचे ठाणे उठून" तोंडाचे बोळके होते. नैसर्गिक दात पुन्हा येत नसले तरी आता त्यांच्या जागी कृत्रिम दात लावायची सोय झाली आहे. त्यामुळे अन्न चावायलाही मदत होते आणि चेहेराही दंतहीन दिसत नाही.

निसर्गाने मानवाला दिलेल्या पाच ज्ञानेंद्रियांपैकी 'डोळा' हे सर्वात महत्त्वाचे आणि संवेदनशील इंद्रिय आहे. डोळ्यांमुळेच आपल्याला आजूबाजूचे जग दिसते, इकडेतिकडे काय आहे किंवा चालले आहे हे समजते आणि आपण या सृष्टीतील रंग, रूप आणि सौंदर्य यांचा आस्वाद घेऊ शकतो. डोळ्यातील बाहुली, भिंग आणि दृष्टिपटल (Retina) यांसारखे घटक मिळून आपल्याला पाहण्यास मदत करतात. डोळ्यांच्या भिंगामधून आत शिरलेल्या प्रकाशामुळे समोरील दृष्याची प्रतिमा  दृष्टिपटलावर तयार होते आणि मज्जातंतूंकडून ती माहिती मेंदूकडे जाते, त्यामुळे आपल्याला ती प्रतिमा 'दिसते'. भिंगांमध्ये असलेल्या नैसर्गिक लवचिकतेमुळे माणूस दूर किंवा जवळ असलेल्या गोष्टी स्पष्टपणे पाहू शकतो. काही लोकांना जवळचे स्पष्ट दिसते, पण लांबचे पुसट दिसते तर काही लोकांना लांबचे स्पष्ट दिसते, पण जवळचे वाचताना त्रास होतो. हे दृष्टिदोष योग्य त्या प्रकारचा चष्मा लावून सुधारले जातात. आजकाल डोळ्यातच फिट बसणारी काँटॅक्ट लेन्स लावायचीही सोय झाली आहे.

वयाच्या ४० नंतर डोळ्यातील भिंगांची लवचिकता कमी होते, त्यामुळे बहुतेक लोकांना जवळचे वाचण्यासाठी चष्मा लावावा लागतो. हा एक उतारवयातला सामान्य विकार आहे. वाढत्या वयानुसार डोळ्यातील नैसर्गिक भिंगातील प्रथिनांची (Proteins) रचना बदलू लागते. ही प्रथिने एकमेकांना चिकटतात आणि भिंगावर पांढरट थर तयार होतो, ज्यामुळे दृष्टी धूसर होते. याला मोतीबिंदू म्हणतात. रक्तातील साखरेचे प्रमाण किंवा रक्तदाब जास्त असल्यास डोळ्यातील भिंगावर त्याचा परिणाम होऊन मोतिबिंदू लवकर होऊ शकतो. तसेच आई-वडिलांना मोतिबिंदू झाला असेल, तर पुढील पिढीत तो होण्याची शक्यता असते. अतिप्रमाणात धूम्रपान केल्याने डोळ्यांतील पेशींचे नुकसान होते. सतत प्रखर सूर्यप्रकाशात राहिल्याने आणि डोळ्यांचे संरक्षण न केल्याने अतिनील प्रकाशकिरणांमुळे मोतिबिंदूचा धोका वाढतो. व्हिटॅमिन 'ए' आणि 'सी' युक्त आहाराच्या कमतरतेमुळे आणि  इतर आजारांसाठी दीर्घकाळ स्टिरॉइड्स युक्त औषधे किंवा ड्रॉप्स वापरल्यामुळे मोतिबिंदू होण्याची शक्यता वाढते. अशा काही कारणांमुळे अनेक वयस्कर लोकांना कधी ना कधी मोतिबिंदूचा त्रास सुरू होतो. 

मोतीबिंदूची वाढ ही अत्यंत सावकाश होत वर्षानुवर्षे चालणारी क्रिया आहे. सुरुवातीच्या काळात मोतिबिंदू जाणवतही नाही. मलाही त्याचा पत्ताच लागला नव्हता. पण मी एकदा एका कार्यक्रमाला गेलो असतांना माझ्या समोर बसलेला प्रेक्षक थोडा उंच असल्यामुळे त्याचे डोके थोडे आड येत होते. त्यामुळे मला स्टेजवरचे दृष्य दोन्ही डोळ्यांनी अर्धे अर्धे दिसत होते. त्यात फरक वाटल्यामुळे मला शंका आली आणि मी डॉक्टरकडे तपासणासाठी गेलो. जसजसा डोळ्यातला मोतीबिंदू वाढत जातो, तसे काही बदल दिसायला लागतात. उदाहरणार्थ पुसट दिसणे, समोरच्या हेडलाईटचा खूप त्रास होणे, प्रकाशाभोवती वलये (Halos) दिसणे, रंग गडद न दिसता फिके किंवा पिवळसर दिसू लागणे, एकाच डोळ्याने पाहताना वस्तूच्या दोन प्रतिमा दिसणे इ. मोतिबिंदूतला पांढरा थर जास्त वाढला तर तो भिंगावर दिसायलाही लागतो. पूर्वीच्या काळी मोतीबिंदू पूर्ण वाढ होऊन'पिकल्यावर' तो काढून टाकणे एवढाच उपाय होता, पण त्यातून पहिल्यासारखी दृष्टी मिळत नसे. पण आता फेको-इमल्सिफिकेशन या आधुनिक पद्धतीने  एका लहान छिद्राद्वारे अल्ट्रासोनिक लहरींचा वापर करून खराब झालेले नैसर्गिक भिंग काढले जाते आणि त्या जागी कृत्रिम भिंग (IOL) बसवले जाते. त्यानंतर जवळ जवळ पूर्ण दृष्टी प्राप्त होते. क्वचित काही लोकांना काचबिंदू (Glaucoma) नावाचा मोतिबिंदूपेक्षा वेगळा आणि अधिक गंभीर आजार होतो. यात डोळ्यांच्या नसांना (Optic Nerve) इजा होते. आपल्या डोळ्याच्या पुढच्या भागात 'ॲक्वियस ह्युमर' (Aqueous Humor) नावाचा एक पारदर्शक द्रव सतत तयार होत असतो. हा द्रव डोळ्यांना पोषण देतो, पण काही कारणाने तो डोळ्यात साचू लागतो. यामुळे डोळ्याच्या आतला दाब (Pressure) वाढतो. हा वाढलेला दाब डोळ्याच्या मागच्या बाजूला असलेल्या 'दृष्टी चेता' (Optic Nerve) वर दबाव टाकतो, या नसांमधील तंतू हळूहळू मरू लागतात. यामुळे दृष्टी कायमची जाऊ शकते. या व्याधीवर कायमचा इलाज नाही. तो आटोक्यात ठेवण्यासाठी काही उपाय आहेत, त्यांचा उपयोग केला जातो.

कान हे सुद्धा डोळ्यांसारखेच अत्यंत महत्वाचे संवेदनशील ज्ञानेंद्रिय आहे. कानांमधल्या श्रवणशक्तीमुळेच आपल्याला आजूबाजूचे आवाज ऐकायला येतात. सर्वात मुख्य म्हणजे ऐकणे आणि बोलणे यातून माणूस इतर माणसांबरोबर संवाद साधू शकतो आणि त्यांच्या आवाजातील भाव, अर्थ आणि संदेश समजतात. या संवादामधून त्याला ज्ञान मिळते, तसेच विचार समजतात. जगातल्या विविध भाषा आणि धर्म, पंथ वगैरे संवादांमधूनच तयार झाले आहेत. यामुळे संवादाला मानवी संस्कृतीचा पाया म्हणता येईल. आपण श्रवणशक्तीमुळे  संगीताचा आनंद घेऊ शकतो. ते आपल्या मनाला शांती आणि प्रसन्नता देते.

कानावर पडणाऱ्या आवाजाला मेंदूपर्यंत पोहोचवणे ही एक अतिशय वेगाने आणि गुंतागुंतीने घडणारी प्रक्रिया आहे. आपला बाह्यकर्ण बाहेरून आलेल्या ध्वनी लहरींना एकत्रित करून कानाच्या नळीतून  कानाच्या पडद्यांकडे पाठवतो. ध्वनी लहरी आदळल्यामुळे कानाचा पडदा कंपन पावतो. अंतर्कर्णामधील पेशी  या कंपनांचे रूपांतर विद्युत लहरींमध्ये करून  त्यांना एका 'श्रवण मज्जातंतू' द्वारे मेंदूकडे पाठवतात. तिथे मेंदू या लहरींचे विश्लेषण करतो आणि आपल्याला त्या आवाजाचा अर्थबोध होतो.

आपली अशी अद्भुत श्रवणशक्ती ही ईश्वराची एक महत्वाची देणगी आहे, पण वयोमानानुसार ती हळूहळू क्षीण व्हायला लागते. वयोमानानुसार श्रवणशक्ती कमी होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्याला वैद्यकीय भाषेत 'प्रेसबायकुसिस' (Presbycusis) असे म्हणतात. साधारणपणे ६० वर्षांनंतर ही समस्या प्रकर्षाने जाणवू लागते. वयोमानानुसार अंतर्कर्णामधील  पेशी हळूहळू कमकुवत होतात किंवा नष्ट होतात. एकदा या पेशी नष्ट झाल्या की त्या पुन्हा तयार होत नाहीत, ज्यामुळे ऐकू येणे कमी होत जाते. कानाकडून मेंदूकडे जाणारी श्रवण मज्जातंतू देखील वयानुसार कमकुवत होऊ लागते. यामुळे आवाज ऐकू आला तरी शब्दांचा अर्थ स्पष्टपणे समजत नाही, विशेषतः जिथे खूप गोंधळ किंवा आवाज असेल तिथे बोलणे समजणे कठीण होते. वाढत्या वयात होणाऱ्या इतर विकारांमुळे कानाच्या नाजूक भागांना होणारा रक्ताचा पुरवठा कमी होतो. रक्ताभिसरण नीट न झाल्यामुळे श्रवणशक्तीवर विपरीत परिणाम होतो. अशा कारणांमुळे समोरची व्यक्ती काय बोलत आहे हे स्पष्ट समजत नाही, टीव्ही किंवा रेडिओचा आवाज इतरांपेक्षा जास्त वाढवावा लागतो. आजकाल आधुनिक श्रवणयंत्रांमुळे उतारवयातही संवाद साधणे सोपे झाले आहे. काही वृद्ध त्यांचा उपयोग करतांना दिसतात.

पाठीचा कणा म्हणजे डोक्याच्या कवटीपासून ते कमरेच्या खालच्या भागापर्यंत ३३ लहान हाडांची एक लांब साखळी असते. या लहान हाडांना 'मणके' म्हणतात. हे मणके एकमेकांवर अशा प्रकारे रचलेले असतात आणि त्यांना आजूबाजूच्या स्नायूंनी असे बांधून ठेवलेले असते की ज्यामुळे आपल्याला वाकता, फिरता आणि हालचाल करता येते. पाठीच्या कण्याच्या मध्यभागी एक पोकळी असते, त्यातून मज्जारज्जू आरपार जातो. पाठीचा कणा या अत्यंत नाजूक मज्जारज्जूचे बाहेरील आघातांपासून संरक्षण करतो. हा कणा शरीराला आधार देऊन सरळ उभे राहण्यास मदत करतो. यासाठी तो मजबूत आणि ताठ असतो पण हालचाल करण्यासाठी आवश्यक तेवढा लवचिकपणाही त्यात असतो. त्यासाठी मणक्यांच्या मध्ये 'गादी' (Discs) सारखा मऊ भाग असतो, ज्यामुळे चालताना किंवा उडी मारताना शरीराला बसणारे धक्के शोषले जातात.

ताठ पाठीचा कणा हे केवळ शारीरिक रचनेचे लक्षण नसून, ते मानवी स्वभाव, नैतिकता आणि स्वाभिमानाचे एक अत्यंत प्रभावी प्रतीक मानले जाते. 'न वाकणारा कणा' म्हणजे अन्यायासमोर न झुकणे, संकटातही आपली तत्त्वे न सोडणे,  आत्मविश्वास आणि बाणेदारपणा. ज्याप्रमाणे पाठीचा कणा शरीराचा भार पेलतो, त्याचप्रमाणे स्वाभिमानाचा 'कणा' माणसाच्या व्यक्तिमत्वाचा भार पेलतो.

पण वाढत्या वयानुसार हाडांमधील कॅल्शियम आणि खनिज पदार्थांचे प्रमाण कमी होते. यामुळे पाठीच्या कण्याचे मणके कमकुवत होतात. अनेकदा शरीराचे वजन पेलताना मणक्यांच्या पुढील भागावर जास्त दाब आल्याने ते थोडे दबतात, यामुळे पाठीला नैसर्गिकरित्या बाक येतो आणि व्यक्ती पुढे झुकते. दोन मणक्यांच्या मध्ये असलेली 'गादी' सरकल्यामुळे स्लिप डिस्कचा त्रास सुरू होतो किंवा तिची झीज झाल्यामुळे पाठीचा कणा आपली नैसर्गिक रचना गमावतो आणि त्याला बाक येऊ लागतो. पाठीला सरळ ठेवण्यासाठी पाठीचे आणि पोटाचे स्नायू मजबूत असणे आवश्यक असते. वयोमानाने हे स्नायू कमकुवत झाल्यामुळे शरीराचा वरचा भार पेलणे कठीण जाते आणि व्यक्ती झुकलेल्या अवस्थेत चालते.  चुकीची झोपण्याची, बसण्याची किंवा उभे राहण्याची पद्धतसुद्धा पाठीच्या कण्यावर ताण देते आणि त्याला बाक येऊ शकतो. अशा काही कारणांमुळे अनेक वयस्क लोक कंबरेत वाकून काठी टेकत चालतांना दिसतात. नाटकात किंवा व्यंगचित्रांमध्ये तर त्यांना हमखास तसे दाखवले जाते.  पण आजच्या काळात योग्य आहार, नियमित व्यायाम आणि आधुनिक वैद्यकीय उपचार (कॅल्शियम सप्लिमेंट्स इ.) मुळे अनेक ज्येष्ठ नागरिक ८० व्या वर्षीही ताठ कण्याने चालताना दिसतात.

 

माणूस किंवा माणसाचे शरीर म्हणजे नुसता हाडामांसाचा गोळा असतो असे म्हंटले जाते कारण ते मुख्यतः एक हाडांचा सांगाडा आणि त्यावर ठिकठिकाणी बसलेले मांसांचे थर यातूनच बनलेले असते. त्या सर्वांवर त्वचेचे सुंदर आवरण लपेटलेले असते.  मूल जन्माला येतांना या तीन्हींना घेऊन येतो आणि वयाबरोबर त्यांची वाढ होत जाते. तारुण्यात आल्यावर ती वाढ थांबते, तरीही पुढे जन्मभर रोज कित्येक जुन्या पेशी झिजून नष्ट होत असतात आणि सुमारे तितक्याच आणि तशाच प्रकारच्या नव्या पेशी जन्माला येऊन त्यांची संख्या टिकून राहते. जुन्या पेशी आणि नव्या पेशी मिळून त्यांची कामे चालवत राहतात. त्यात कसलाही खंड पडत नाही ही एक अद्भुत गोष्ट आहे. 

पण उतारवयात या प्रक्रियेत हळूहळू किंचित बदल होत असतात. वयानुसार हाडांमधील कॅल्शियम आणि इतर खनिजांचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे हाडे पोकळ आणि ठिसूळ होतात आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो. साध्या धक्क्यामुळेही शरीरातले एखादे हाड मोडू शकते.  सांध्यांमधील कूर्चा (Cartilage) झिजल्यामुळे सांधेदुखी आणि आखडपणा जाणवतो. पाठीच्या कण्यातील मणक्यांमधील अंतर कमी झाल्यामुळे व्यक्तीची उंची थोडी कमी झाल्यासारखी वाटते, त्यात बाक येतो. स्नायूंची ताकद आणि आकार कमी होतात. या प्रक्रियेला 'सार्कोपेनिया' (Sarcopenia) म्हणतात. स्नायूंचे तंतू कमी झाल्यामुळे अंगात पूर्वीसारखी ताकद राहत नाही आणि लवकर थकवा येतो. स्नायू आणि कंडरा (Tendons) कडक होतात, ज्यामुळे शरीराची हालचाल मंदावते. स्नायू कमकुवत झाल्यामुळे चालताना तोल जाण्याची शक्यता वाढते.  उतारवयात घसरून किंवा तोल जाऊन पडणे हे फार मोठ्या समस्यांना आमंत्रण देते. या विकाराचा मला जो अनुभव येत आहे त्याबद्दल खाली सविस्तर लिहिले आहे.

त्वचेवर वयोमानाचा परिणाम सर्वात आधी आणि स्पष्टपणे दिसून येतो. त्यामुळेच उतारवयातला माणूस लगेच ओळखून येतो. त्वचेतील 'कोलेजन' आणि 'इलास्टिन' या प्रथिनांचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्वचेचा ताण कमी होतो आणि सुरकुत्या पडतात. त्वचेखालील तेल ग्रंथी (Sebaceous glands) कमी सक्रिय होतात, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि खडबडीत बनते. त्वचेचा थर पातळ होतो, ज्यामुळे लहानशा जखमेनेही रक्तस्त्राव होऊ शकतो किंवा काळेनिळे डाग पडू शकतात. त्वचेवर ठिकठिकाणी काळे किंवा तपकिरी ठिपके (Age spots) दिसू लागतात. 

यातल्या कशावरच कायमचा खात्रीशीर इलाज नसतोच, पण योग्य आहार (कॅल्शियम आणि प्रथिनेयुक्त), नियमित हलका व्यायाम आणि पुरेशी झोप यांमुळे हे बदल पूर्णपणे थांबवता येत नसले तरी त्यांची गती नक्कीच कमी करता येते. ते प्रयत्न करून आपली उरलीसुरली क्षमता शक्य तितका काळ टिकवणे हाच एक उद्योग होऊन बसतो.  

पाठीच्या कण्याबद्दल लिहितांना मी मज्जारज्जूचा उल्लेख केला होता. त्याला बाह्य आघातापासून सुरक्षित ठेवण्यासाठी देवाने किंवा निसर्गाने या पोकळ मणक्यांच्या साखळीची योजना केली आहे. मज्जारज्जू किंवा स्पायनल कॉर्ड हा आपल्या मेंदूला शरीराच्या इतर भागांशी जोडणारा मुख्य 'माहिती महामार्ग' (Information Highway) मानला जातो. तो मेंदूपासून निघालेल्या संदेशांना हातापायांपर्यंत आणि इतर अवयवांपर्यंत पोहोचवतो. तसेच, शरीराच्या विविध भागांकडून येणारे संवेदन (उदा. स्पर्श, वेदना, तापमान) मेंदूकडे पाठवण्याचे काम करतो. या संवादामुळेच आपण शरीराच्या हालचाली करू शकतो. आपल्या चालण्याच्या, धावण्याच्या किंवा उभे राहण्याच्या प्रक्रियेत मज्जारज्जूची भूमिका महत्त्वाची असते. तो स्नायूंच्या आकुंचन आणि प्रसरणावर नियंत्रण ठेवून शरीराचा तोल सांभाळण्यास मदत करतो. काही वेळा आपल्याला विचार न करता त्वरित कृती करावी लागते, जसे की गरम वस्तूला हात लागल्यावर तो तातडीने मागे घेणे. याला प्रतिक्षिप्त क्रिया (Reflex Actions) म्हणतात. अशा वेळी संदेश मेंदूपर्यंत जाऊन निर्णय येईपर्यंत वाट न पाहता, मज्जारज्जू स्वतःच निर्णय घेतो आणि स्नायूंना आदेश देतो. थोडक्यात सांगायचे तर मज्जारज्जूशिवाय आपला मेंदू शरीराच्या कोणत्याही भागाला साधी हालचाल करण्याची सूचना देऊ शकणार नाही किंवा आपल्याला स्पर्शाची जाणीवही होणार नाही. मज्जारज्जूला होणारी इजा किंवा त्याच्याशी संबंधित विकार शरीराच्या हालचालींवर आणि संवेदनांवर गंभीर परिणाम करू शकतात.

गंभीर स्वरूपाच्या अपघातात पाठीचा कणा मज्जारज्जूचे संरक्षण करण्यात असमर्थ ठरला तर त्याचा मेंदूशी असलेला संपर्क तुटतो. यामुळे अपंगत्व येऊ शकते. स्पाँडिलोसिस (Spondylosis) हा उतारवयात होणारा एक आजार आहे. यात वयानुसार मणक्याच्या हाडांमध्ये आणि चकतीमध्ये (Disks) झीज होते. यामुळे मज्जारज्जूवर किंवा त्यातून निघणाऱ्या नसांवर दाब येतो, ज्यामुळे मान किंवा कंबर दुखते. माझ्या ओळखीतल्या एका गृहस्थांना उजव्या हाताच्या बोटांच्या अचूक हालचाली करता येईनात.  ते डाव्या हातांनी लिहायला शिकले आणि काम करायला लागले. स्लिप डिस्क या आजारात मणक्याच्या दोन हाडांमधील मऊ चकती सरकते आणि मज्जारज्जूवर दाब निर्माण करते. यामुळे तीव्र वेदना, मुंग्या येणे किंवा स्नायूंमध्ये कमकुवतपणा जाणवतो. स्पाइनल स्टेनोसिस (Spinal Stenosis) या विकारात मणक्याची पोकळी अरुंद होते. यामुळे मज्जारज्जू आणि नसा दबल्या जातात.  मज्जारज्जूमध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला गाठ (Tumor) तयार झाल्यामुळे मज्जारज्जूवर दाब येतो. अशा कुठल्याही कारणामुळे नाजुक मज्जारज्जूवर दाब येण्यामुळे त्रास होतो. हात किंवा पायांमध्ये बधिरता किंवा मुंग्या येणे, स्नायू कमकुवत होणे किंवा चालताना तोल जाणे, तीव्र पाठदुखी किंवा मानदुखी, मल-मूत्र विसर्जनावर नियंत्रण सुटणे, अचानक शरीराचा एखादा भाग नीट हलवता न येणे अशासारखी लक्षणे दिसायला लागतात. त्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

उतारवयात स्नायूंची ताकद आणि आकार कमी होतात. या प्रक्रियेला 'सार्कोपेनिया' (Sarcopenia) म्हणतात.  सार्कोपीनिया हे नाव ऐकल्यावर तो इथिओपियासारखा आफ्रिकेतला देश असावा असं वाटतं ना? पण तो दूर आफ्रिकेतला देश नाही तर तो इथे घरबसल्या आपल्या शरीरातच तयार होतो.  बाहेरचे कुठले कृमी, कीटक, रोगजंतू किंवा व्हायरस त्याला घेऊन येत नाहीत, तो शरीरात आपोआप तयार होतो. चोवीस तास घरात बसून राहणाऱ्या घरकोंबड्या लोकांना तर हमखास होतो. आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्याची बाधा झालेली दिसते, पण त्यांना त्याचे नाव माहीत नसते, मलाही माहीत नव्हते.  आयुष्यभर दगदग, धडपड आणि धावपळ केल्यामुळे हातपाय दमतात आणि त्यामुळे त्यांना कंटाळा येणे, विश्रांती घ्यावी असे वाटणे हे नैसर्गिकच आहे असे समजले जाते. एरवी माणसाच्या शरीरातल्या स्नायूंना पुरेशी विश्रांती दिल्यानंतर ते ताजेतवाने होऊन पुन्हा जोमाने काम करायला तयार होतात, पण बहुतेक लोकांच्या उतार वयात ते तसे करेनासे होतात. त्यांची शक्ती हळूहळू कमी कमी होत जाते.  कधी एखाद्या आजारपणाचे निमित्य झाले तर तसे वेगानेही होते. हातापायांची कुठलीही हालचाल करतांना त्यातले काही स्नायू ताणले जातात आणि काही ढिले होत असतात. या क्रियेमुळेच ते अवयव हलत असतात. हे काम आपल्या नकळत चोवीस तास चाललेले असते. पण हा वेडा सार्कोपिनिया अंगात शिरला की या हालचालीच नकोशा वाटायला लागतात आणि त्या करायचे टाळले तर तो जास्तच बळावतो. 

मी गेली तीन चार दशके नियमितपणे रोज अर्धापाऊण तास चालायचा व्यायाम करतच आलो आहे. तीनचार वर्षांपूर्वी माझ्या घोट्याजवळची दोन हाडे मोडल्यामुळे त्यांचे ऑपरेशन केल्यानंतर हातात काठी आली. पाय दुरुस्त झाल्यानंतर मी काठी टेकत टेकत रोज फिरायला जातच होतो. पण हळूहळू माझी गति कमी होत गेली. आम्ही दहा पंधरा वयस्क लोक संध्याकाळी फिरून आल्यानंतर कट्ट्यावर बसून गप्पा मारतो. त्या संपल्यावर बाकीचे तुलनेने नववयस्क लोक उठून लगेच झपाझप चालायला लागतात. पण मला उठल्यावर दोन तीन सेकंद आपला तोल सांभाळून उभे राहून एक एक पाऊल टाकायला लागायचे. असे का होते हे मी आमच्या डॉक्टर मित्रांना विचारल्यावर ते म्हणाले, "विशेष काही नाही, सार्कोपिनिया असेल." तेंव्हा मी हा शब्द पहिल्यांदा ऐकला. त्यांनी त्यावर काही उपाय सांगितला नाही, फक्त प्रोटीन्स खा आणि हालचाल करत रहा एवढेच सांगितले. 

माझा चालायचा वेग कमी झाला आहे हे मी आमच्या हृदयरोगतज्ञालाही सांगितले. त्यांनी सगळ्या तपासण्या करून सांगितले की हृदय तर ठीक दिसते आहे. कदाचित सार्कोपीनिया असेल. त्यावर उपाय म्हणून त्यांनी फिजिओथेरपी घ्यायला सांगितले. फिजिओथेरेपिस्टने पंचवीस प्रकारचे व्यायाम सांगितले. त्यात झोपून, बसून आणि उभे राहून हातापायांचे एक एक सांधे वाकवायचे आणि पाच पाच सेकंद त्या अवस्थेत धरून ठेवायचे असतात. यालाच कदाचित रेझिस्टन्स ट्रेनिंग म्हणत असतील. ते रोज करून माझे काही स्नायू जरा बळकट झाले असावेत. निदान आपण काही तरी प्रयत्न करत आहोत याचे समाधान मिळते. 

इंटरनेटवर सार्कोपीनियावर बरीच माहिती उपलब्ध आहे. डेक्सास्कॅन नावाची तपासणी करून त्याचे निदान करता येते म्हणे, पण मी ते करायचा प्रयत्न केला नाही. कारण सार्कोपीनिया आहे असे कन्फर्म झाले तरी त्यावर काहीच इलाज नाही.  त्यापेक्षा तो असावा असे समजून जास्त प्रोटीन आणि एबीसीडीई जीवनसत्वे खात रहाणे आणि सतत हातापायाच्या हालचाली करत रहाणे मला ठीक वाटते.

"साठी बुद्धी नाठी" अशी एक मराठी म्हण आहे. हिंदीमध्येही "सठिया जाना" असा वाक्प्रचार आहे. एखादा वृद्ध माणूस काही अनपेक्षित गोष्टी करायला लागला तर त्याला म्हातारचळ लागले आहे असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. या सगळ्यांचा रोख उतारवयात होत असलेल्या मानसिक बदलांकडे असतो. वाढत्या वयात शरीरासोबतच मेंदूमध्येही काही नैसर्गिक बदल होत असतात.  ते काही वेळा विशिष्ट विकारांचे संकेत असू शकतात. उतारवयात प्रामुख्याने दिसणारे मेंदूचे विकार खालीलप्रमाणे आहेत:

१. स्मृतिभ्रंश (Dementia) : यामध्ये काही गोष्टी आयत्या वेळी न आठवल्यामुळे विचार करण्याची, लक्षात ठेवण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. तशी ती सर्वच लोकांमध्ये हळूहळू कमी होत असते. नुकत्याच घडलेल्या गोष्टी विसरणे, परिचित पत्ता किंवा रस्ता न सापडणे, बोलतांना योग्य शब्द न सुचणे, समोरच्या व्यक्तीचे नाव न आठवणे, साध्या हिशोबात चुका होणे आणि या सगळ्यांमुळे स्वभावात अचानक चिडचिडेपणा किंवा बदल होणे असे अनुभव जवळजवळ सगळ्याच वयस्कर लोकांना अधून मधून येत असतात. पण त्यामुळे दैनंदिन जीवनात विशेष बाधा येत नसेल  तर ते चालून जाते. सामान्य विसरभोळेपणा आणि गंभीर मेंदूचा विकार (विशेषतः डिमेंशिया किंवा अल्झायमर) यातील फरक ओळखणे सुरुवातीला कठीण वाटू शकते. पण  विसरण्याचे स्वरूप आणि त्याचा दैनंदिन कामावर होणारा परिणाम यावरून ते समजते. सामान्य माणसाला विसरलेली गोष्ट, शब्द किंवा नाव काही वेळानंतर आपोआप आठवते, पण स्मृतिभ्रंशामध्ये ती पूर्णपणे पुसली गेलेली असते. अल्झायमर (Alzheimer's Disease) या आजारात व्यक्ती हळूहळू जुन्या गोष्टी पार विसरू लागते आणि तिला दैनंदिन कामे करणे कठीण होते. समजा, त्यांनी नुकतेच जेवण केले असेल, तर त्यांना आपण जेवलो आहोत हेच आठवत नाही आणि ते पुन्हा जेवण मागतात किंवा एकच प्रश्न पाच दहा मिनिटाने पुन्हा पुन्हा विचारतात. अशी व्यक्ती स्वतः तर स्वतःला सांभाळू शकत नाहीच, पण तिला सांभाळणाऱ्या व्यक्तीलाही ते फार कठीण जाते. हातपाय धडधाकट असल्यामुळे ते लोक हिंडूफिरू शकतात, पण कधी कधी बाहेर गेल्यावर परत घरी यायचा रस्ता विसरतात आणि आपला पत्ता कुणाला नीट सांगूही शकत नाहीत.  माझ्या ओळखीचे एक गृहस्थ एकदा आमच्याबरोबर बाहेर एका ठिकाणी आले होते. कारमधून परत येतांना आम्ही त्यांना ते कुठल्या बिल्डिंगमध्ये राहतात असे विचारले आणि त्यांनी सांगितलेल्या बिल्डिंगपाशी सोडले. पण ते आत न जाता उलट दिशेने चालायला लागले. मग आम्ही जास्त चौकशी करून ते त्यांच्याच घरी जातील अशी व्यवस्था केली. काही लोकांना मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे किंवा छोट्या स्ट्रोकमुळे  व्हॅस्क्युलर डिमेंशिया हा आजार होतो.

२. पार्किन्सन (Parkinson's Disease) हा हालचालींशी संबंधित विकार आहे. यात हात-पाय थरथरणे (Tremors), शरीराचा ताठरपणा आणि हालचालींचा वेग अतिशय मंदावणे, चालताना तोल जाणे अशी मुख्य लक्षणे दिसतात. मेंदूमध्ये 'डोपामाइन' (Dopamine) नावाच्या रसायनाची कमतरता झाल्यामुळे हा विकार होतो. हातापायांच्या हालचाली करण्यासाठी किंवा शरीराचा तोल राखण्यासाठी स्नायूंना जे आदेश मेंदूकडून दिले जात असतात, त्यांची नीट अंमलबजावणी या विकारात होत नाही आणि त्या हालचाली अनियंत्रित रीतीने होतात.

३. मेंदूचा झटका (Stroke) : जेव्हा मेंदूच्या एखाद्या भागाला होणारा रक्तपुरवठा थांबतो किंवा मेंदूतील रक्तवाहिनी फुटते, तेव्हा स्ट्रोक येतो. यामुळे अर्धांगवायू (Paralysis), बोलण्यात अडथळा किंवा दृष्टीदोष होऊ शकतो. हा फार गंभीर प्रकार आहे.

४. नैराश्य आणि चिंता (Depression & Anxiety): उतारवयात एकटेपणा, शारीरिक व्याधी किंवा निवृत्तीनंतरच्या बदलांमुळे मानसिक आरोग्य बिघडू शकते. अनेकदा नैराश्याची लक्षणे स्मृतिभ्रंशासारखी वाटू शकतात, ज्याला 'स्युडो-डिमेंशिया' म्हणतात. नैराश्यामुळे माणूस मानसिक दृष्ट्‍या खचून जातो. 

हे विकार होऊ नयेत यासाठी माणसाने उतारवयातही वाचन, लिखाण, शब्दकोडी सोडवणे किंवा नवीन कौशल्य शिकणे यासारखे बौद्धिक व्यायाम सुरू ठेवावेत, नियमित चालणे फिरणे, प्राणायाम आणि योगासने करावीत, संतुलित आहार घ्यावा आणि मित्र आणि नातेवाईकांशी संवाद कायम ठेवावा.

देवाच्या कृपेने मी आता 'अवघे पाउणशे वयमान' पार करून ऐंशीचा टप्पा गाठला आहे. शारदा नाटकातल्या "म्हातारा अवघा"शी तुलना केली तर माझ्याही बहुतेक दंताजींनी आपले ठाणे उठवले आहे, त्यातले फक्त चार शिलेदार आपले ठाणे अजूनही लढवत राहिले आहेत, पण कृत्रिम दातांनी तोंडावर ताबा मिळवला असल्यामुळे मी नेहमीचे अन्न चावून खाऊ शकतो. दोन्ही कान अजून तरी निदान पन्नास टक्के ध्वनि मेंदूपर्यंत पोचवतात, गाणे ऐकून ते रफीने गायले आहे की मुकेशने हे मला बरोबर समजते.  डोळ्यामधली ओरिजिनल भिंगे रुसून बसली होती, पण डॉक्टरांनी त्यांना हुसकावून लावून त्यांच्या जागी कृत्रिम भिंगे लावून दिली असल्यामुळे मी सगळे पाहू शकतो आणि वाचू शकतो,  मान अजून तरी नन्ना करत नाही. तुरळक कोठें केस रुपेरी, डोइस टक्कल छान । हे मात्र शंभर टक्के झाले आहे.  हातात काठी आली असली तरी वयाचा भार वाहून कंबर कमान झालेली नाही आणि अंगातल्या अवसानाबद्दल तर विचारूच नका. आपण काय काय गमावले याचा विचार न करता जे काय शिल्लक राहिले आहे ते जमेल तितका काळ जपायची धडपड मी सुरू ठेवली आहे.


Sunday, February 22, 2026

विज्ञानाची कहाणी

 विज्ञानाची कहाणी


ऐका कृपया लक्ष देउनी, विज्ञानाची अजब कहाणी ।

कधी बाष्प तर बर्फ ही कधी, विविध रूपे धरते पाणी ।।


हिमालयावर अति थंडीने, बर्फाचे थर किति जमती ।

सूर्यकिरण पडता त्यांवरती, गंगा यमुना सरिता होती ।।


पृथ्वीवरल्या या पाण्याची,  वाफ होयि जायी वरती ।

नभी पुन्हा एकत्र येउनी,  ते कण ढग रूपे धरती ।।


थंड होउनी त्यांच्यातुनही, कोसळती त्या जलधारा ।

कधी गोठुनी बर्फ होउनी, गारांचाहि होतो मारा।।  


जल असे पारदर्शक जरी, सूक्ष्म कण त्यांचे होती ।

दाट धुक्याच्या रूपाने ते, हवेलाच धूसर करती।


हवेतल्या या सूक्ष्म कणांचे, सुंदर दंवबिंदूही होती ।

प्रभातकाळी फुलांफुलांवर, किती पहा ते चमचमती ।। 


या पाण्याने जरी व्यापली, आहे अपुली अवघी धरती ।

परि चांदोबाच्या ओढीने, नित्य सागरा येई भरती।।


आर्किमिडिजने या पाण्याचे, कथिले उद्धरण धर्म ।

बर्नौलीने दाखवले काही, जल प्रवाहाचे नियम ।।  


              * * *

भारत देशी प्राचिन काळी, होते महान ऋषी कणाद ।

विचार आगळे कथावयाचा, त्यांना होता हो भारी नाद ।।


जन म्हणती आहे वेदातच, भरलेले सगळेही ज्ञान ।  

पण कणाद यांनी मांडियले, अपुले वैशेषिक  तत्वज्ञान ।।


या विश्वाचा भव्य पसारा, निर्माण हा कसा हो झाला ।

याचा सखोल शोध घेण्याचा, दृढनिर्धार तयांनी केला ।।


अतिविशाल जे पर्वत असती, माती वायू  अथवा नीर ।

सजीव पक्षी अन् प्राण्यांचे, वा किड्यांचे असे शरीर ।।


जे काही दिसणारे किंवा, असणारेही या जगतात ।

सारे अतिसूक्ष्म कणांचे गट, हा कथिला अणुसिद्धांत ।।   


              * * *


आर्यभट्ट प्राचीन भारती, झाले एक महान शास्त्रज्ञ । 

खगोल गणित या शास्त्रांचे, त्यांना होते अगाध ज्ञान ।।


बहु संशोधन करुनी तयांनी, संस्कृत ग्रंथ नवे लिहिले ।

वैज्ञानिक सिद्धांत अन् सूत्रे, यांना काव्यातचि रचिले ।।


नौकेमधुनी तीरावरली, जन जी झाडे बघतात ।

ती तर त्यांना मागे मागे, पळतांना हो दिसतात ।। 


तद्वत सारे या नभातले, तारे ते स्थिर असतात ।

परि पृथ्वीच्या गतीमुळे ते, भासे आकाशी फिरतात ।।


अंशाच्या 'ज्या' 'कोज्या' यांचे, त्यांनी कोष्टक होते केले । 

परीघ आणिक त्रिज्या यांचे, मुख्य सूत्र ही सांगितले ।।


त्यांच्या संबंधातचि असतो , 'पाय' नावे विशिष्ट अंक ।

मूल्य तयाचे आर्यभटांनी, सांगितले अगदी अचुक ।।


मूढ जनां परि महत्व या, विज्ञानाचे नाही कळले ।

काळाच्या ओघात सर्व ते, ज्ञानच झाकुनिया गेले ।।  


                 * * *

दीर्घ काळ विज्ञानसाधना, जगात लोपुनिया गेली।

पण काही शतकांच्या नंतर, युरोपात जागृत झाली ।। 


कोपरनिकस नावाचा होता, पोलंड या युरोपी देशी ।

ज्ञानी धर्मगुरू होता पण, सदा लक्ष देइ आकाशी।।


ग्रह ताऱ्यांचे सूक्ष्म निरिक्षण, करतांना बहु वर्षे त्याने ।  

कुठला ग्रह कोण्या राशीत, नोंद ठेवली नित नेमाने ।। 


सूर्य चंद्र बुध शुक्र तारका, मंगळ बृहस्पती व शनी । 

भ्रमण कसे करतात नभी, अभ्यासाचा या ध्यास मनी ।।


रविची होई एका वर्षात, बारा राशींतून भ्रमंती।

बुध  शुक्र हे सदा सर्वदा, त्याच्या जवळच वावरती।।


गुरू घेतसे बारा वर्षे,  शनी शनैःशनैः फिरतो ।

तो तर तब्बल तीस वर्षे, एका भ्रमणाला घेतो ।।


मंगळ मोठा कलंदर ग्रह, नसतो त्याचा नेम कधी ।

जलद कधी तर हळू जातसे, मार्गी किंवा वक्रि कधी।।


ग्रहांच्या भ्रमणामधली ही, विसंगती त्याला खुपली ।

या विश्वाच्या निर्मात्याने, चूक नसेल अशी केली।।


होता दृढ विश्वास तयाचा, मग अपुले कोठे चुकते ।

सूर्य मधोमध असे कल्पुनी, त्याने सगळी केली गणिते ।।


सुसंगती त्यातली पाहुनी, त्याची पक्की खात्री झाली ।

सूर्यमालिका नवी कल्पना, त्याने निजग्रंथी मांडियली ।।


अज्ञ जनांना दोन शतके, तरिही ती नव्हती पटली ।

परी जाणत्या शास्त्रज्ञांनी, नंतर ती उचलुनि धरली ।।


प्रत्यक्षात या सर्व ग्रहांचे, सूर्य भ्रमण न दिसे कोणा ।

पण विज्ञानाच्या किमयेने हे, झाले जगती मान्य जना ।।

            * * *

   - आनंद घारे

 

Monday, February 09, 2026

2024 आणि 2025

 मी पूर्वी कित्येक वर्षे अगदी रोज नाही तरी दोन तीन दिवसात एकदा रोजनिशी लिहून त्या दिवसांमध्ये घडलेल्या महत्वाच्या घटना, केलेले प्रवास, भेटलेली माणसे, केलेले निरीक्षण, विश्लेषण, निष्कर्ष, घेतलेले निर्णय, केलेली कामे किंवा महत्वाची खरेदी वगैरेंच्या सविस्तर नोंदी करून ठेवत होतो आणि वर्षाअखेर त्या वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद घेत होतो. पण ते दुसऱ्या कुणाला जाहीरपणे सांगत नव्हतो. मी अशा तीस चाळीस डायऱ्या जमा करून ठेवल्या होत्या आणि सेवानिवृत्तीनंतर निवांतपणे त्यातल्या नोंदींवरून पुस्तक(पुस्तके) लिहायचा विचारही केला होता, कारण एके काळी सगळे मोठे लोक तसे काही तरी करत होते असे मी कुठेतरी वाचले होते.  पण मी सेवेमधून निवृत्त झाल्यानंतरसुद्धा बदललेल्या परिस्थितीत अनेक व्यवधानांमध्ये गुंतत गेलो. त्यामुळे मला त्या कामासाठी कधी 'निवांत' असा वेळ मिळालाच नाही. शिवाय मी लिहिलेली पुस्तके कुणी वाचावी एवढा मोठा माणूस, लेखक किंवा शास्त्रज्ञही मी कधी झालो नव्हतोच. यामुळे त्या बिचाऱ्या डायऱ्या माळ्यावर तशाच पडून राहिल्या होत्या. अखेर मी मुंबई सोडून पुण्याला आल्यावर इथे त्यांना ठेवायला जागाही नव्हती म्हणून त्या नष्ट करून टाकल्या. असेही आता सगळे जग डिजिटल आणि पेपरलेस झाले आहे. 

गेल्या कित्येक वर्षांमध्ये मी एकही डायरी विकत घेतली नाही किंवा कुणाकडून मला भेट म्हणूनही मिळाली नाही. त्यामुळे ती लिहिण्याचा प्रश्नच उद्भवला नव्हता. गेल्या दोन वर्षभरांतल्या काही आठवणी मनात साचून राहिल्या आहेत तेवढ्याच. पण तिथे त्या क्रमाने मांडून ठेवलेल्या नसतात. मी फेसबुकवर अधूनमधून काही स्फुट लेख लिहित असतो, ते संगणकावर साठवले आहेत. माझ्या मोबाइलशी सहज खेळत असतांना पाहिले की त्या डिव्हाइसने माझ्या काही आठवणी ओळीवार जमवून ठेवल्या आहेत किंवा माझ्या आळशीपणामुळे त्या तिथे साचून राहिल्या आहेत. त्यात काही वॉट्सॅप मेसेज, काही फोन कॉल्सच्या नोंदी, असंख्य फोटो हे तर आहेतच, मी यूपीआयने कुणाकुणाला पैसे दिले त्यावरूनही ते कशासाठी दिले होते हे लक्षात येते. त्या सगळ्यांमधून गेली दोन वर्ष कशी गेली याचे एक अंधुक चित्र डोळ्यासमोर उभे राहते. ते या लेखात सांगण्याचा हा प्रयत्न.

२०२४

२०२४ या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात दोन विलक्षण घटना घडल्या, त्या दोन्ही निरनिराळ्या परदेशांमधल्या होत्या. 

दक्षिण आफ्रिकेतील केप टाउन शहरात खेळला गेलेला भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी सामना फक्त दोन दिवसातच संपला. या सामन्यात दोन्ही संघांकडून मिळून फक्त ६४२ चेंडू खेळले गेले. हा आतापर्यंतचा जगभरातला सर्वात लहान कसोटी सामना ठरला. दक्षिण आफ्रिका संघाने आधी फलंदाजीला सुरुवात केली, पण जेवणाच्या वेळेपर्यंत त्यांचा संपूर्ण संघ फक्त ५६ धावा काढून बाद झाला. त्यानंतर भारतीय संघाने दमदार सुरुवात केली, पण त्यांचाही डाव गडगडला आणि फक्त १५३ धावा काढून सर्व खेळाडू तंबूत परत आले. खेळाच्या पहिल्याच दिवशी अशा प्रकारे दोन्ही संघांचा पहिला डाव संपला आणि दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावातलेही २-३ खेळाडू बाद झाले. दुसरे दिवशी उरलेले सगळे खेळाडूही बाद झाले तोपर्यंत त्या संघाच्या १७६ धावा झाल्या होत्या. पहिल्या डावातली ९७ धावांची आघाडी लक्षात घेता भारतीय संघाला विजयासाठी फक्त ८० धावा हव्या होत्या. त्यांनी तेवढ्या धावा त्याच दिवशी करून सामना संपवून टाकला. 

पूर्वी कसोटी सामने पाच दिवस चालत आणि तरीही बरेच वेळा ते अनिर्णित रहात असत. टीव्ही आल्यानंतर त्यावर पाच दिवसांचे सामने पहाणे फार कंटाळवाणे वाटत असे. त्यामुळे त्याला तितकेसे प्रेक्षक मिळत नव्हते आणि प्रेक्षक नाहीत म्हणून जाहिराती मिळत नव्हत्या. टीव्ही चॅनल्सचे सगळे अर्थकारण जाहिरातींच्या उत्पन्नावरच तर चालत असते.  पण एका हुशार माणसाने क्रिकेटला आकर्षक बनवण्यासाठी ५०-५० षटकांचे सामने सुरू केले तर त्यानंतर आणखी कुणी २०-२० षटकांचे सामने सुरू केले. त्यांना क्रिकेटप्रेमी जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि टीव्हीवरील मॅचेसना जाहिरातदारांचे  जोरदार पाठबळ मिळाले. त्यात टीव्ही कंपन्या, जाहिरात कंपन्या तसेच खेळाडूंच्या संघटनांनी खोऱ्याने पैसा ओढला आणि काही लोक कोट्याधीश किंवा अब्जाधीशही झाले. क्रिकेट खेळाडूंनाही चांगले दिवस आले. तरीही रुचिपालटासाठी अजूनही पाच दिवसांचे कसोटी सामने सुरू ठेवले आहेतच.  पाच दिवस चिकाटीने खेळत राहून दोन दोन इनिंग्जमध्ये धावांचे डोंगर रचणे किंवा सलग दहा वीस ओव्हर गोलंदाजी करणे यातच फलंदाज आणि गोलंदाजांची खरी कसोटी लागते. क्रिकेट या खेळाचा खरा आत्मा यातच आहे, पण दोन वर्षांपूर्वी त्यात एक नवा इतिहास घडला.  हे सामने जर असे दोन दिवसात संपायला लागले तर मात्र त्यात काही मजा राहणार नाही.

. . . . 

दुसरी विलक्षण घटना जपानमध्ये घडली,  ती होती जपानमधला जबरा विमान अपघात.

टोकियोतल्या हेनाडा विमानतळावर जपान एअरलाइन्सचे एक जम्बोजेट विमान (Airbus A350) हवेतून खाली उतरत होते. ते धावपट्टीवर उतरत असतांनाच तिथे आधीच असलेल्या किंवा अचानक आलेल्या कोस्टगार्डच्या छोट्या विमानाला धडकले आणि क्षणार्धात तिथे आगीचा डोंब उसळला. तरीही मोठ्या विमानातले ३६७ प्रवासी आणि १२ कर्मचारी असे एकूण ३७९ लोक सुखरूपपणे विमानाबाहेर येऊ शकले. काही वेळानंतर ते विमान जवळजवळ पूर्णपणे जळून खाक झाले. आगीचे बंब त्या विमानाला वाचवू शकले नाहीत. कोस्ट गार्ड विमान (MA722) आदल्या दिवशी झालेल्या भूकंपग्रस्तांसाठी मदत साहित्य घेऊन निघाले होते. यामध्ये ६ कर्मचारी होते. मात्र, दुर्दैवाने कोस्ट गार्डच्या विमानातील ६ पैकी ५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर वैमानिक गंभीर जखमी झाला.

आगीमुळे मोठ्या विमानातले दिवे मालवले गेले होते, विमानात धूर पसरत होता आणि ध्वनिक्षेपक काम करत नव्हते. विमानातले कर्मचारी टॉर्च दाखवून आणि ओरडून सूचना देत होते. विमानाचे तीन आपातकालिन दरवाजे (इमर्जन्सी एक्झिट्स) उघडले गेले आणि त्यातून घसरगुंड्या खाली सोडल्या गेल्या. सर्व प्रवासी फक्त ९० सेकंदात एका मागोमाग त्यांवरून घसरत जमीनीवर आले.  

हा अपघात अत्यंत भीषण असूनही, जपान एअरलाईन्सच्या विमानातील सर्व ३७९ प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. ही घटना जगभरात 'चमत्कार' आणि उत्कृष्ट सुरक्षा प्रशिक्षणाचे उदाहरण मानली गेली.  मी जो व्हीडिओ पाहिला त्यात त्यासाठी काही कारणे देण्यात आली होती. पहिले म्हणजे हे जपान-अंतर्गत उड्डाण असल्यामुळे त्यात बहुतेक सगळे जपानी प्रवासी होते. ते अतिशय शिस्तबद्ध होते. त्या प्रवाशांनी कसलाही गडबडगोंधळ किंवा धक्काबुक्की केली नाही, सगळ्या सूचना निमूटपणे ऐकल्या आणि तंतोतंत त्यानुसार त्वरेने हालचाली केल्या. कुणीही रॅकमधले सामान काढण्याचा प्रयत्न केला नाही. ते जवळच्या दरवाजापाशी रांगेने चालत जाऊन घसरगुंडीवरून एका मागोमाग असे करत खाली घसरत गेले. दुसरे म्हणजे जरी विमानाने पेट घेतला असला तरी त्याचा सांगाडा शाबूत होता त्यामुळे दरवाजे उघडता आले. तिसरे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विमानातील पायलट आणि केबिन क्रूने अशा प्रसंगी अजिबात न गांगरून जाता आणि क्षणभराचाही विलंब न लावता विलक्षण धैर्याने सगळी आपत्कालीन कामे व्यवस्थितपणे केली. अर्थातच त्यांचे अत्यंत उच्च दर्जाचे ट्रेनिंग झाले असणार यात शंका नाही. एअरबस A350 सारख्या आधुनिक विमानांमधील आग रोधक साहित्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. शेवटी सगळ्या प्रवाशांचे दैव तर बलवत्तर होतेच.

प्राथमिक तपासानुसार, संवादामध्ये झालेल्या चुकीमुळे (Communication gap) ही दुर्घटना घडली असावी असे समोर आले. कोस्ट गार्डच्या विमानाला धावपट्टीच्या बाहेर थांबण्याच्या सूचना होत्या, परंतु ते विमान धावपट्टीवर आले. त्याच वेळी जपान एअरलाईन्सच्या विमानाला उतरण्याची परवानगी मिळाली होती, ज्यामुळे दोन्ही विमानांची टक्कर झाली. अर्थातच यात काही तरी गंभीर गफलत झाली होती. 

---

बहुतेक सगळ्यांनी आयुष्यात कधी ना कधी रस्सीखेच हा खेळ खेळलेला असतोच. पहायला गेल्यास हे करायचे का ते करायचे यामधला रस्सीखेचाचा खेळ रोजच आपल्या जीवनात चाललेला असतो. सध्या थंडीच्या दिवसात सकाळी उठून कामाला लागायचे का उबदार पांघरुणात लोळत पडायचे यामध्ये थोडा वेळ रस्सीखेच चाललेली असतेच. या विश्वामधला प्रत्येक पदार्थ गुरुत्वाकर्षण नावाच्या अद्ष्य दोरीने प्रत्येक दुसऱ्या पदार्थाला आपल्याकडे खेचत असतो, पण लहानसहान पदार्थाने लावलेला जोर नगण्य असल्यामुळे आपल्याला तो जाणवत नाही. पृथ्वीने मात्र आपल्याला जखडून ठेवलेले असते. उडी मारून तिच्यापासून थोडे दूर जायचा प्रयत्न केला तरी ती लगेच खेचून जमीनीवर आणते.

पृथ्वी आणि सूर्यचंद्र हे गोलही गुरुत्वाकर्षणाने एकमेकांना आपल्याकडे ओढत असतात, पण पृथ्वी आधीच प्रचंड वेगाने कुठेतरी जायला निघालेली असते त्यामुळे ती सूर्यावर जाऊन आदळत नाही, तरी या आकर्षणामुळे ती सूर्याभोवती फिरत राहते. अशाच प्रकारे चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो आणि पृथ्वीबरोबर तोही सूर्याभोवती फिरत असतो.

आकाशात पाठवलेले कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे तिच्याभोवती फिरत असतात, पण आकाशात अशा काही जागा आहेत जिथे असलेल्या वस्तूला जितक्या बलाने पृथ्वी तिच्याकडे ओढत असते नेमके तितक्याच बलाने सूर्य त्याच्याकडे ओढत असतो आणि याशिवाय तो सेंट्रिफ्यूगल फोर्समुळे त्याच्यापासून दूर फेकला जात असतो. या तीन्ही बलांच्या रस्सीखेचेमुळे तो पदार्थ पृथ्वीकडे येतही नाही किंवा पृथ्वी भोवती फिरतही नाही. पण तोही पृथ्वीबरोबर सूर्याला प्रदक्षिणा घालत राहतो.

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताने पाठवलेला आदित्य हा उपग्रह एल १ नावाच्या अशा बिंदूवर जाऊन पोचला आहे. आता तिथे बसून तो संशोधनकार्य करत राहील आणि ती माहिती पृथ्वीवर पाठवत राहील. भारताचा अशा प्रकारच्या संशोधनाचा हा पहिलाच प्रयत्न आहे. आतापर्यंत अमेरिका, युरोप (एकूण देश मिळून), जपान, चीन आणि आता भारत अशा प्रमुख ५ शक्तींनी सूर्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी आपले उपग्रह अंतराळात पाठवले आहेत. 

------------

प्राणप्रतिष्ठा

अयोध्येतल्या भव्य नव्या मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा कार्यक्रम २२ जानेवारीला प्रचंड थाटामाटात साजरा झाला. देवळाचे बांधकाम पूर्ण होण्याचीसुद्धा वाट न पाहता आधीच केलेल्या या कार्यक्रमाची अक्षत महिनाभर आधीच अख्ख्या देशाला (की जगाला) देऊन ठेवली होती. अक्षतांचे हजारो कलश गावागावांमध्ये जंगी शोभायात्रा काढून वाजत गाजत मिरवत नेले होते. लक्षावधी लोक क्षणभर का होईना, तो कलश डोक्यावर घेऊन 'जय श्रीराम'चा गजर करत उन्मादाने नाचले होते आणि त्याचे फोटो काढून त्यांनी आपल्या संग्रहात ठेवले होते. नंतर या अक्षता गोळा करून अयोध्येला पाठवल्या गेल्या होत्या. 

या वर्षाच्या सुरुवातीपासूनच या नियोजित कार्यक्रमाची चर्चा सुरू होती. निरनिराळ्या टीव्ही चॅनेल्स आणि यू ट्यूब वरील व्हीडिओज यात रोज चाललेली उलटसुलट चर्चा किंवा बाचाबाची यांचा कंटाळा येण्याइतका अतिरेक होत होता. माझ्या आठवणीत तरी दुसऱ्या कुठल्याही देवळातल्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला इतकी अचाट पूर्वप्रसिद्धी मिळाली नव्हती. उत्साही लोक फक्त चॅनेल्सवरील बातम्या आणि चर्चा पाहून थांबले नाहीत तर गावोगावी त्यांनी मोठ्या मिरवणुका काढल्या, त्यात हौसेने नाचत गात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि त्यांच्या व्हीडिओही पसरवल्या. जिकडे तिकडे दिवाळीसारखी रोषणाई केली. अगदी दुबईच्या बुर्ज खलीफापासून जगभरातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये विजेचा झगमगाट केला गेला होता.

देशभरातल्या सगळ्या नामवंतांना या समारंभाचे आमंत्रण दिले होते आणि त्यातले अनेक लोक तिथे व्यक्तिशः हजर झाले होते. इतर असंख्य लोकांना त्या कार्यक्रमाला जायची इच्छा होती, पण परवानगी मिळत नव्हती. त्या समारंभाचे टीव्हीवर होत असलेले थेट प्रक्षेपण लक्षावधी (किंवा कोट्यावधी) लोक डोळ्याची पापणी लवू न देता पहात बसले होते. त्यानंतरही अयोध्येला जाण्यासाठी भाविकांनी रीघ लावली होती. तिथे जाऊन पोचण्यासाठी विमाने, आगगाड्या, बसेस वगैरेंची तसेच तिथे राहण्यासाठी खूप चांगली सोय केली गेली होती आणि या वर्षात अयोध्येला भेट देणाऱ्या लोकांच्या संख्येने पूर्वीचे सगळे उच्चांक मोडून ताजमहाललाही मागे टाकले होते.  इतकेच नव्हे तर अयोध्येला भेट देणाऱ्या लोकांची संख्या व्हॅटिकन आणि मक्कामदीना या प्रमुख स्थलांना जाणाऱ्या लोकांच्या संख्येलाही ओलांडून गेली असे ऐकले. 

अयोध्येच्या या कार्यक्रमाचा धावता वृत्तांत टीव्हीवर दाखवला जात होता, तो असंख्य लोकांनी आपापल्या घरी बसून तर पाहिलाच, पण अनेक संकुलांमध्ये खूप लोकांनी एका जागी जमून मोठ्या स्क्रीनवर एकत्र पाहिला आणि पाहता पाहता श्रीरामाच्या नामाचा जयघोष केला. श्रीरामाची ही नवी मूर्तीही फारच लोभसवाणी आहे. ती करणाऱ्या शिल्पकाराचे कौतुक करायलाच हवे. हे सगळे जितके अवर्णनीय होते तितकेच अनपेक्षितही होते.

------

हे वर्ष सुरू होण्याच्या आधीपासूनच भारतातल्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेध लागायला सुरुवात झाली होती. कुणी तरी मला विचारले, "का हो, तुमचं नाव व्होटर्स लिस्टमध्ये आहे का?"

मी म्हंटलं, "पाच वर्षापूर्वी तर होतं. आणि मी काही ते काढून टाका म्हणून कुणाला सांगितलं नव्हतं म्हणजे ते असेलच."

त्यानं विचारलं, "कुठे होतं?"

मी सांगितलं, "धायरीला. त्या वेळी मी तिथे रहात होतो"

"आता या वेळी काय करणार? मत द्यायला धायरीचा जाणार की काय?

"बघीन, जमलं तर जाईन."

"पण तुमचं नाव इकडे ट्रान्स्फर करून घ्या ना."

"कसं ?"

"अगदी सोप्पं आहे. एकदा धायरीजवळच्या मामलेदार कचेरीत जा आणि एक फॉर्म भरा म्हणजे तुमचं तिथलं  नाव कट होईल. मग एकदा मुळशीच्या मामलेदार कचेरीत जाऊन दुसरा एक फॉर्म भरा, इथल्या रहिवासाचे पुरावे द्या. मग तुमचं नाव हिंजवडीच्या लिस्टमध्ये अॅड होईल."

"बरं बरं !"

मी मनात म्हंटलं की माझ्या सध्याच्या शारीरिक अवस्थेत मी तर आमच्या टाउनशिपच्या गेटपर्यंत एकटा जाऊ शकत नव्हतो. तो इकडे तिकडे चकरा कशा मारणार? त्यापेक्षा एकदाच धायरीला जाऊन मत देऊन आलेलं काय वाईट आहे?

आणखी काही दिवसांनी आमच्या कम्युनिटी सेंटरमध्येच दोन माणसे आली. ते "आम्ही नवीन व्होटर कार्ड करून देऊ" असे म्हणाले. मी आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट वगैरे माझ्या अस्तित्वाचे जेवढे पुरावे माझ्याकडे होते ते घेऊन तिथे गेलो.  त्यांच्यातल्या एका मुलाने त्याच्या सेलफोनवरच माझ्या आधार कार्डाचे फोटो काढले, त्यानेच ऑन लाइन कुठलासा फॉर्म भरला आणि माझ्या मोबाइलवर निवडणूक आयोगाकडून एक मेसेज आला. आता दहा बारा दिवसात माझे कार्ड घरपोच येईल असे आश्वासन त्याने दिले. 

दहा पंधरा दिवसाने मी इंटरनेटवर चौकशी केली तर उत्तर आले की माझा फोटो स्पष्ट दिसत नव्हता म्हणून माझा अर्ज नामंजूर करण्यात आला होता. आधार कार्डावरचे फोटो कसे असतात? त्याचा सेलफोनवर काढलेला फोटो अस्पष्ट आला असला तर त्यात काही नवल नव्हते. पण हे काम ऑनलाइन कसे करता येते हे मला आता समजले होते. मी घरबसल्या माझ्या लॅपटॉपवरूनच एक नवा फॉर्म भरला आणि एक वेगळा चांगला फोटो अपलोड केला. लगेच तो पोचला असल्याचा मेसेज मला आला. काही दिवसांनी कार्डही मिळाले, पण त्यात मतदानकेंद्र लिहिले नव्हते. थोडे प्रयत्न केल्यावर ती माहितीही इंटरनेटवरूनच मिळाली.

मतदानाच्या दिवशी सकाळी सकाळी त्या मतदानकेंद्रावर जाऊन माझा नागरिकत्वाचा अधिकार बजावून आलो. कहाणी सुफळ संपूर्ण ।

------

अयोध्येला झालेल्या समारंभात राजकीय हेतू असल्याचा आरोप केला होता आणि तो समारंभ करणाऱ्या लोकांनाही हा हेतू सफळ होईल असेच वाटले असेलही. भाजपला तर यशाची खात्रीच होती  आणि सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यावर त्यांनी "अबकी बार चारसौ पार" हा नारा दिला होता. त्यावर मग नॅरेशन्सचा खेळ सुरू झाला. "संविधान बचाओ।", "लोकतंत्र बचाओ।", "दलितांचे आणि आदिवासींचे आरक्षण रद्द केले जाईल." अशा वाक्यांचा तुफान प्रचार करण्यात आला. दलित, पिछडे आणि अल्पसंख्य समाजांना जबरदस्त भीती दाखवण्यात आली. निवडणुका जवळ आल्यानंतर विरुद्ध पक्षांमधल्या प्रमुख व्यक्तींवर अगदी वाट्टेल ते आरोप प्रत्यारोप करत जोरजोरात बाचाबाची व्हायला लागली. बातम्या दाखवणाऱ्या वाहिनींवर तासतासभराचे चर्चांचे कार्यक्रम दाखवले जायला लागले त्यात निव्वळ आरडाओरडा आणि गोंगाट व्हायला लागल्यावर माझ्यासारख्या अनेक लोकांनी कंटाळून ते पाहणे बंद केले.  टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांवर थोडे तरी निर्बंध असण्याची शक्यता होती. पण या वर्षीच सुरू होऊन अल्पावधीत बोकाळलेल्या यू ट्यूबवरील पॉडकास्टना एकदम मोकळे रान मिळाले होते. टीव्हीवरून दूर गेलेल्या काही लोकांनी आपापल्या चॅनेल्स काढून त्यावर वाट्टेल ते खरेखोटे सांगायला सुरुवात केली आणि त्यांनाही लाखांच्या घरात चाहते मिळायला लागले होते. ते पॉडकास्ट नियमितपणे पहाणाऱ्या लोकांना खात्रीच पटली की या सरकारचे दिवस आता भरत आले आहेत. ते आपापल्या फेसबुक आणि वॉट्सॅपच्या पानांवर तसे लिहायला लागले होते. 

निवडणुकीच्या सातआठ महिन्यांच्या आधीच बहुतेक सगळ्या विरोधी पक्षांनी एकजूट करून I.N.D.I.A.नावाची संयुक्त आघाडी केली होती. तर दोन तीन महिने आधी भाजपानेही आपली कुमक वाढवण्यासाठी नीतीशकुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षांना आपल्या एनडीए आघाडीत सामील करून घेतले होते. इंडी आघाडीने काही नॅरेटिव्हजच्या आधाराने आणि महागाई, बेरोजगारी, सामाजिक विषमता यासारख्या नेहमीच्या मुद्यांवर भर देऊन टीकेचा भडिमार करत तुफानी प्रचार चालवला होता, भाजपनेही त्याला उत्तरे देण्याचा प्रयत्न करून गेल्या दहा वर्षांच्या कारभारात केलेल्या काही चांगल्या कामगिरीच्या आधाराने  प्रचाराचा धूमधडाका लावला होता. या वर्षी या निवडणुका एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने घेतल्या गेल्या आणि त्या दीड महिना चालल्या होत्या. त्यामुळे या वर्षाचे पहिले पाच महिने सगळीकडे त्याचीच धूमधाम चालली होती.

चार जूनला लागलेले निवडणुकीचे निकाल काही लोकांसाठी अनपेक्षित होते. श्रीराममंदिरामुळे भाजपला निवडणुकीत जास्त मते पडली असे दिसले नाही. उलट त्यांची सदस्यसंख्या कमी होऊन २४०वर आली. त्या पक्षाला बहुमत मिळाले नसले तरी एनडीए या आघाडीला बहुमत मिळाले होते. पण I.N.D.I.A.ला तितक्याही जागा मिळाल्या नसल्या तरीही त्यांनी "जितम् मया"चा जल्लोष सुरु केला. आता एनडीएचे सरकार येणारच नाही आणि ते आले तरी टिकणारच नाही असा घोषा लावला.  पण ते सरकार सत्तेवर आले आणि त्याने आपला राज्यकारभार सांभाळला. आता या सरकारकडे मोठे संख्याबळ नसल्यामुळे ते दुर्बल राहील आणि कुठलेही धडाडीचे निर्णय घेऊच शकणार नाही असा नवा नॅरेटिव्ह तयार करण्यात आला.  तरीही तिकडे लक्ष न देता या सरकारने आधीच्या दहा वर्षांत न केलेली कामे येत्या पाच वर्षात पूर्ण करायचा मानस जाहीर केला आणि सगळ्यात आधी वक्फबोर्डाच्या कायद्यात सुधारणा करण्याचे बिल आणून ते एका संसदीय समितीकडे पाठवले. त्यानंतर "एक देश एक निवडणूक" या तत्वाखाली देशभरातल्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेण्याच्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली.  संसदेच्या अधिवेशनांमध्ये आधी विपक्षाने अडाणी अडाणीचा घोषा करत काही काम होऊ दिले नाही, तर नंतर सत्ताधारी पक्षाने सोरोस सोरोस करत वेळ काढला. त्यामुळे ही अधिवेशने धांगडधिंगा, धक्काबुक्की आणि सावळागोंधळ यानेच गाजली. 

लोकसभेच्या निवडणुका होऊन निकाल लागले तरी त्यानिमित्य उडलेला धुरळा थांबला नाही कारण काही राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका लगेच होणार होत्या, त्यात महाराष्ट्रही होते. महाराष्ट्रातली म.वि.आघाडी I.N.D.I.A.चा भाग होता आणि महायुती हा एनडीएचा. आघाडीने I.N.D.I.A.च्या मुद्यांवरूनच जोरदार प्रचार केला होता, त्याशिवाय काही स्थानिक मुद्दे होते. लोकसभेसाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बहुधा फक्त आपापल्या पक्षाचाच प्रचार केला होता. तिचे मतदारही अति आत्मविश्वासामुळे थोडे सुस्तावले असावेत. तरीही इथे झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या दोघींना जवळजवळ सारखीच एकूण मते पडली होती, त्यांच्या मतांमध्ये फक्त अर्धा किंवा पाव टक्के इतकाच किरकोळ फरक होता, पण आघाडीला जास्त जागा मिळाल्या आणि युतीचे कमी खासदार निवडून आले. यावरून असे रान उठवले गेले की महायुति चारी मुंड्या चीत झाली आहे, जनतेने तिला धुडकावून लावले आहे, विधानसभेच्या निवडणुकीत तिचा सपशेल धुव्वा उडणार आहे वगैरे. आघाडी सोडून युतीमध्ये आलेले लोक आता आघाडीत परत जायला निघाले आहेत अशा अफवाही उडवल्या गेल्या.

दोन निवडणुकांच्या मधल्या काळात युति  सरकारने आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी काही पावले उचलली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी मन लावून जास्त प्रचार केला आणि जास्त मतदारांना मतदान करायला प्रवृत्त केले.  आघाडीच्या घटक पक्षांमध्ये कुणाला किती आणि कोणत्या जागा हव्या यावर आपापसात कुरबुर झाली. संविधान, लोकशाही वगैरे त्यांचे मुद्दे या निवडणुकीत कामाचे नव्हतेच. मधल्या काळात काही इतर घडामोडी होऊन गेल्या. यू ट्यूबवर मराठीमधून पॉडकास्ट करणाऱ्या लोकांचा युतीकडे जास्त कल होता. या सगळ्या कारणांमुळे या वेळी जास्त टक्के मतदारांनी मतदान केले. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकांचे निकालही पुन्हा अनपेक्षित लागले.  

पण पहायला गेल्यास यावेळीसुद्धा त्यावरून अवास्तव गाजावाजा केला गेला होता. निवडणुकीच्या आधी शिवसेनेच्या उबाठा गटाचे आणि रा.काँ.च्या शप गटाचे मिळून जेवढे आमदार होते त्यापेक्षा दोन जास्तच जागा त्यांना निवडणुकीत मिळाल्या. रा.काँ.चे जे आमदार आघाडीमधून युतीत आले होते त्यातलेच बहुतेकजण पुन्हा निवडून आले. युतीमध्ये आलेल्या शिवसेनेच्या आमदारांच्या संख्येत तर वाढ झाली. फक्त काँग्रेसच्या आमदारांच्या संख्येत घट झाली आणि भाजपची संख्या वाढली.

 मी सहसा कधी राजकीय घडामोडींवर लिहित नाही. पण २०२४ हे संपूर्ण वर्ष निवडणुकांवर होत असलेल्या चर्चा आणि अवास्तव गवगवा, नॅरेटिव्हज यातच गेल्यामुळे मी त्यांचा एक निष्पक्ष आढावा घेतला आहे. त्या वर्षभरात या घडामोडींचाच इतका मोठा गदारोळ चालला होता की इतर क्षेत्रांमधल्या घडामोडी तितक्याशा लक्षात राहिल्या नाहीत.

------------------

जीवन प्रमाणपत्र

मी १९९८मध्ये भारत सरकारच्या सेवेमधून निवृत्त झालो होतो तेंव्हापासून मला दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जिवंत असण्याचा दाखला देणे आवश्यक झाले होते. त्यासाठी बँकेत जाऊन एक चार पानांचा फॉर्म भरावा लागत होता. बँकेचे ऑफिस घराजवळच असल्याने येताजाता कधीतरी जास्त गर्दी नाही असे पाहून मी ते काम करून घेत होतो. २००५ मध्ये एनपीसीमधून रिटायर झाल्यानंतर मी वाशीला रहायला गेलो आणि बँक अणुशक्तीनगरलाच होती. त्यामुळे तिथे जाऊन फॉर्म भरणे ही एक वार्षिक कटकट होऊन बसली होती. मी पुण्याला रहायला आलो त्या वर्षीच बँकेने नवी सोय करून दिली होती. आता मी कुठल्याही ब्रँचमध्ये जाऊन हे काम इंटरनेटवरून करू शकत होतो.  त्यानंतर दरवर्षी मी एका ब्रँचमध्ये जाऊन जीवनप्रमाण सर्टिफिकेट  देऊ लागलो. त्या कामासाठी बँकेत एक मशीन ठेवलेले असते त्यावर आपला अंगठा किंवा दुसरे एकादे बोट ठेवायचे आणि त्या यंत्रामधून गेलेल्या संदेशात त्या बोटांवरच्या रेषांची ओळख पटली तर  काम पुढे सरकते. बऱ्याचशा वृद्धांच्या बोटांवरील रेषा वयोमानाने पुसट होतात आणि त्या यंत्राकडून वाचल्या जात नाहीत. माझ्याही बाबतीत तसे होत असे. त्यामुळे या कामात फार वेळ लागायला लागला होता.

२०२३ मध्ये आणखी एक नवी सोय झाली होती. त्यात आंगठ्याच्या ठशाऐवजी चेहेऱ्यावरून ओळख पटवली जाते. मी त्याची माहिती करून घेतली. माझ्या मुलाने ते नवे अॅप सेलफोनवर डाउनलोड करून घेतले आणि थोडे चाचपडत आम्ही दोघांनी मिळून ते चालवून जीवनप्रमाण सर्टिफिकेट मिळवले. २०२४ या वर्षी मात्र मी स्वतःच प्रयत्न करायचे ठरवले, सगळी आवश्यक कागदपत्रे शोधून जवळ ठेवली आणि जीवनप्रमाण अॅप उघडले. त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आवश्यक ती माहिती म्हणजे वेगवेगळे आकडे  भरत गेलो, कॅमेरासमोर चेहेरा आणून दोन मिनिटे डोळे मिचकावले आणि सक्सेसफुल झालो आहे असा संदेश मिळाला.  

कुठे ते उन्हातानात बँकेपर्यंत जाऊन धक्के खाणे आणि कुठे घरबसल्या पाच मिनिटात सगळे काम होणे?  तंत्रज्ञानाचा जयजयकार !!!

------

सन २०२४ हे वर्ष भारतात झालेल्या निवडणुकीच्या धामधुमीचे होते, तसेच अमेरिका म्हणजे यूएसएसाठीसुद्धा होते. २०२०च्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रंप आणि डेमॉक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांच्यात सामना झाला होता त्यात जो बायडेन निवडून आले होते. २०२४मध्ये पुन्हा याच दोन उमेदवारांना त्यांच्या पक्षांकडून नॉमिनेशन मिळाल्यामुळे त्यांच्यातच सामना होईल असे आधी वाटत होते, परंतु वाढते वय आणि आरोग्याच्या कारणास्तव बायडेन यांनी २१ जुलै २०२४ रोजी आपली उमेदवारी मागे घेतली आणि कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला. त्यामुळे वर्षाअखेर झालेल्या  त्या वर्षीच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रंप आणि कमला हॅरिस यांच्यात सामना होता. यातले कोणीही निवडून आले असते तरी तो एक विक्रम होणार होता. ट्रंप जिंकले तर आधीची निवडणूक हरलेल्या पूर्व राष्ट्राध्यक्षाने पुन्हा जिंकून परत यावे अशी गेल्या सव्वाशे वर्षांमध्ये न घडलेली घटना घडणार होती आणि कमला हॅरिस जिंकल्या असत्या तर त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष झाल्या असत्या, तसेच भारतीय वंशाची पहिली व्यक्ती त्या पदावर पोचणार होती. हा सामना अटीतटीचा होणार अशी भाकिते होती तरी डोनाल्ड ट्रंप यांनी तो चांगल्या दणदणित फरकाने जिंकला. 

----

जहाजाची पुलाच्या खांबाशी टक्कर

टायटॅनिक जहाज हिमनगावर आपटून बुडाले आणि दोन विमानांनी वर्ल्डट्रेडसेंटरच्या टॉवर्सना धडक देऊन जमीनदोस्त केले या ऐतिहासिक दु्र्घटनांची आठवण करून देणारा एक भीषण अपघात वर्षाच्या अखेरीस अमेरिकेतल्या  बाल्टिमोर बंदरात झाला. त्यात जास्त जीवितहानी झाली नसली तरी किती मोठी पडझड झाली हे खाली दिलेल्या चित्रांवरून दिसेल. हा पूल आधी कसा होता हे वरच्या चित्रात दाखवले आहे. या पुलाखालून रोजच किती तरी जहाजे जात येत असत. पण त्या रात्री एक मालवाहू जहाज बंदरातून बाहेर निघतांना या पुलाच्या जवळ आले तेंव्हा अचानक त्याचा वीजपुरवठा खंडित झाला, त्यामुळे नियंत्रणावर परिणाम होऊन ते जहाज भरकटत पुढे जात असतांना पुलाच्या एका खांबाला आदळले आणि जवळजवळ दोन किलोमीटर लांबीच्या त्या पुलाचा बराच मोठा भाग धाडकन कोसळून खाली पडला. कार चालवणारा चालक ब्रेक दाबून तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो किंवा स्टीअरिंग व्हील गर्रकन फिरवून धडक टाळायचा प्रयत्न करतो तरीही रस्त्यात कधी कधी अपघात होतातच. पाण्यातल्या जहाजाला थांबवण्याचे किंवा वळवण्याचे कोणते उपाय असतात माहीत नाही, पण त्यांना जास्तच मर्यादा असणार.

हे जहाज सिंगापूरच्या कंपनीचे आहे, पण त्या वेळी ते चालवणारे बरेचसे दर्यावर्दी भारतीय होते. त्यांनी जहाजावरील नियंत्रणाची परिस्थिती पाहून 'मे डे' चा निर्वाणीचा इशारा दिला. तो ऐकून पुलावरची वाहतूक थांबवली गेली आणि बरीचशी प्राणहानी वाचवता आली. याबद्दल त्यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले गेले. तरीही त्यांना जहाजावरच थांबवले गेले होते आणि या अपघाताची चौकशी पूर्ण होईपर्यंत तिथेच रहावे लागण्याची शक्यता होती. 

या अपघातात  तो पूल पार मोडून गेला आहे आणि त्याचे अवाढव्य सांगाडे पाण्यात पडले आहेत, त्यातले काही भाग तर त्या जहाजावरच पडले आहेत . त्या जहाजाचे किती नुकसान झाले त्याची माहिती समोर आली नसली तरी ते जहाज बुडालेले नाही, ते तरंगत राहिले. त्यावर शिगोशीग लादलेल्या सामानाचे काही नुकसान झाले असेलच. कोसळलेल्या पुलाचे सगळे भाग आणि ते जहाज यांना दूर करेपर्यंत बंदरातली वाहतूक सुरू करणे शक्य नव्हते.  पण कोसळलेला पूल पुन्हा बांधायला निदान एकदोन वर्षे लागतील. तोवर तिथली वाहतूक वळसा घालून दूरच्या मार्गाने वळवावी लागेल. यातूनही अप्रत्यक्ष तोटे होतीलच. या दुर्घटनेने कुणाला केवढा मोठा फटका बसला हे ते सगळे हिशोब केल्यानंतर समजेल. तोपर्यंत बहुतेक लोक ही घटना विसरून गेले असतील.

चित्रे गूगलवरून साभार.

------

पर्यावरण विरुद्ध पर्यावरण

या शतकात पर्यावरण या विषयाला अधिकाधिक महत्व आणि प्राधान्य मिळत आहे. पर्यावरणवादी लोकांमध्येही प्रकार आहेत. काही लोकांचे असे ठासून सांगणे असते की माणसाच्या मूर्खपणामुळे आणि अप्पलपोटेपणामुळे तो पर्यावरणाची अपरिमित हानी करत आला आहे. त्यामुळे जगाचे तापमान वाढायला लागले आहे. आताच अनेक ठिकाणचे गरम हवामान असह्य होत आहे. आणखी काही वर्षांनी पृथ्वीवर सगळीकडेच हाहाःकार माजणार आहे वगैरे वगैरे. या निष्कर्षाला काही शास्त्रीय निरीक्षणांची जोड मिळत असल्यामुळे ते सर्वमान्य होऊन जगभरातली सरकारे यावर उपाय शोधत आहेत. कोळसा किंवा खनिज तेल जाळून वीज उत्पादन करणे कमी करून ते अखेर थांबवणे आणि विजेचे उत्पादन सौर ऊर्जा किंवा वायु ऊर्जा अशासारख्या मार्गांनी करणे हा एक मार्ग आहे. त्या दृष्टीने गुजराथ आणि राजस्थानसारख्या राज्यांमधल्या मरुभूमीवर प्रचंड क्षमतेची सौर ऊर्जा केंद्रे स्थापन केली जात आहेत.

दुसऱ्या प्रकारच्या पर्यवरणवाद्यांना निसर्गातले पशुपक्षी, वनस्पती यांची खूप काळजी वाटते. यांच्या काही प्रजाती आतापर्यंत नामशेष झाल्या आहेत आणि इतर अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. गुजराथ, राजस्थान भागातले माळढोक पक्षी कमी होत चालले आहेत. त्याला इतरही काही कारणे आहेत, पण वीज वहन करणाऱ्या तारा आणि त्यांना आधार देण्यासाठी उभे केले जात असलेले मनोरे यांच्यामुळे या पक्ष्यांना धोका आहे असे मानून ते उभारण्यावर बंदी घालावी अशी मागणी काही पक्षीप्रेमी लोकांनी केली. तो वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आणि २०२१ साली त्या न्यायालयाने एक आदेश काढून सुमारे ८०,००० स्क्वेअर किलोमीटर इतक्या मोठ्या विभागात बंदी घातली. पण त्यातल्या काही भागांमध्ये सौर ऊर्जा केंद्रे उभारण्याचे कामही सुरू आहे. तिथे निर्माण झालेली वीज वाहून नेण्यासाठी तारा आणि मनोरे तर हवेतच. 

याचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे नवा आदेश काढून काही भागात मनोरे बांधायला परवानगी दिली आहे.  आता त्या भागातून उडणाऱ्या माळढोक पक्ष्यांनी स्वतःची काळजी घ्यावी.

--------

या जगात रोज अनेक घटना घडत असतात, त्या तिथे हजर असलेल्या लोकांना थेट समजतात. पण त्या घटनांची माहिती जगातल्या इतर लोकांनाही करून द्यावी यासाठी वृत्तसंस्था, वाहिन्या, वर्तमानपत्रे यासारख्या यंत्रणा काम करत असतात. वाचकांना आश्चर्याचा धक्का बसेल किंवा त्यांना आनंद, दुःख, राग, भीती, काळजी, असूया असे काही वाटेल अशा बातम्या निवडून त्यांना आकर्षक मथळे देऊन त्या रोजच्या वर्तमानपत्रात दिल्या जातात. या शिवाय अमक्या तमक्या प्रसिद्ध लोकांनी कुठकुठल्या ठिकाणी केलेल्या भाषणांमध्ये काय काय सांगितले यांच्याच बातम्या तयार करून त्यांनी वर्तमानपत्रांची अनेक पाने भरली जातात. 

पण २०२४साली  काही दिवस मला असे दिसत आले की आदल्या दिवशी सुप्रीम कोर्टात किंवा कुठल्या तरी हायकोर्टात काय झाले याचीच बातमी रोजच्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर ठळक मथळ्यांखाली दिलेली  असायची. शहाण्या माणसाने कधीही कोर्टाची पायरी चढू नये असे मी लहानपणीच ऐकले आणि वाचले होते आणि माझ्या नशीबाने मला ती कधीच चढावी लागली नाही. 'कानून' किंवा 'कायद्याचं बोला' अशासारख्या सिनेमांमधूनच मी कोर्टसीन पाहिले आहेत. त्यामध्ये जे खटले दाखवतात त्यात एक न्यायाधीश असतो आणि फिर्यादी, आरोपी, त्यांचे वकील, साक्षीदार, बघे लोक वगैरे लोक असतात.  त्यांचे  वादविवाद किंवा युक्तिवाद चाललेले असतात आणि मधून मधून "ऑब्जेक्शन", "ऑव्हररूल्ड", "सस्टेन्ड" वगैरे शब्दांची पखरण असते. ते पाहतांना थोडी मजा येते. पण इसवी सन २०२४मधल्या काही काळात  सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांच्या ज्या बातम्या वर्तमानपत्रात रोज येत होत्या त्यात रोज काही तरी वेगळेच दिसत होते. यातले बरेचसे खटले केंद्र सरकार किंवा एखादे राज्य सरकार यांच्याच विरुद्ध चाललेले असायचे. सर्वसामान्य माणसाला दोन्ही बाजूंचे म्हणणे बरोबरच वाटायचे. आजकाल सरकारने एक नवा कायदा केला की लगेच त्याच्याविरुद्ध कोर्टात अर्ज दाखल केला जातो. यात कोणी गुन्हेगार नसतोच, त्या कायद्यामुळे देशाचा किंवा देशातल्या जनतेचा काय फायदा होणार आहे हा मुद्दा गौण असतो. तो कायदा घटनेच्या कुठल्या कलमाला धरून आहे किंवा नाही यावरच सगळा काथाकूट चाललेला दिसतो. त्याला बातमी कसे म्हणता येईल आणि ते वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर ठळक अक्षरात का येत होते त्याचेच मला गूढ वाटत होते.

-----

टी ट्वेंटी विश्वकप

२०२४मधील जून महिन्याची सुरुवात निवडणुकीचे काहीसे धक्कादायक निकाल आणि त्यानंतर घडत गेलेले नाट्य यावर होत असलेल्या चर्चांमध्ये झाली. पण ज्यांना राजकारणात फारसा रस नसेल आणि क्रीडाविश्वात असेल त्यांच्यासाठी जूनचा संपूर्ण महिना या विश्वकपाचे सामने पहाण्यात मजेत गेला. हे सामने यू एस ए आणि वेस्ट इंडीजमध्ये खेळले गेले. या वेळेला तब्बल वीस देशांच्या संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. हे देश जगाच्या पाचही खंडांमधून आले असल्यामुळे ही स्पर्धा खरोखरच जागतिक होती. खाली दिलेल्या नकाशातले गडद आणि फिका निळ्या रंगात दाखवलेले देश पूर्वीपासून क्रिकेट खेळत आहेत, हिरव्या रंगात दाखवलेल्या देशांना या स्पर्धेत नव्याने प्रवेश दिला गेला. पिवळ्या रंगात दाखवलेल्या देशांनाही यायची इच्छा होती, पण प्राथमिक फेरी जिंकू न शकल्यामुळे त्यांना संधी मिळाली नाही. 

या वीस संघांना चार गटांमध्ये विभागले गेले, त्यात एकमेकांशी खेळून विजयी झालेले प्रत्येक गटातले दोन दोन संघ पुढे गेले. या आठ देशांना सुपर एट असे नाव दिले गेले.  यूएसए आणि अफगाणिस्तान या देशांनी काही धक्कादायक विजय मिळवून त्यात प्रवेश केला, तर न्यूझिलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका मागे राहिले. सुपर एटमधील संघांचे पुन्हा दोन गट पाडून प्रत्येक गटातले दोन संघ सेमिफायनलला गेले. भारताने त्याच्या गटात असलेल्या ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश या तीनही संघांवर विजय मिळवून अव्वल स्थान मिळवले तर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या संघांनी आधी एक एक सामने जिंकले. त्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा केलेला पराभव धक्कादायक होता. अफगाणिस्तान आणि बांग्लादेश यांच्यामधला शेवटचा सामना झाला त्यात बांग्लादेशचा विजय झाला असता तर त्या तीनही देशांचे समान गुण झाले असते.  ऑस्ट्रेलियाचा रन रेट चांगला असल्यामुळे त्या संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला असता, पण जर बांग्लादेशाने या सामन्यात खूपच चांगला रनरेट मिळवला असता तर तो ऑस्ट्रेलियाला मागे टाकू शकला असता. त्यामुळे या सामन्यातही कोण जिंकतो आणि किती धावांनी जिंकतो यावर अखेरपर्यंत उत्सुकता होती. अगदी शेवटच्या क्षणी अफगाणिस्तानने हा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आणि बलाढ्य समजला जाणारा ऑस्ट्रेलिया चक्क एलिमिनेट झाला. तो सेमिफायनलला पोचू शकला नाही.  पण अफगाणिस्तानचा संघ मात्र पुढे दक्षिण आफ्रिकेकडून अगदीच सहजपणे हरला. भारताच्या संघाने इंग्लंडवर विजय मिळवून आधी होऊन गेलेल्या विश्वकपातील पराभवाचे उट्टे काढले.

दक्षिण आफ्रिका आणि भारत संघांमधला अंतिम सामना तर कमालीचा अटीतटीचा झाला.  भारताने धडाक्यात सुरुवात केली, पण तीन गडी पटापट तंबूत परत गेल्यामुळे त्यांच्या धावांची गती मंद झाली. नंतर आलेल्या खेळाडूंनी थोडी ठोकाठोक करून १७६ धावा जमवल्या.  हा  टी-२० विश्वचषकाच्या फायनलमधील सर्वाधिक स्कोअर होता. आधी त्या धावा पुरेशा वाटत होत्या कारण दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही चांगली झाली नाही. त्यामुळे भारत जिंकेल असे वाटत होते. पण नंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी तडाखेबंद  फलंदाजी करून सामना आपल्या हातात घेतला. त्यांना शेवटच्या पाच षटकांमध्ये फक्त तीस धावा करायच्या होत्या आणि फक्त पाचच खेळाडू बाद झाले होते. अशा परिस्थितीत ते हा सामना सहज जिंकू शकतील असे वाटायला लागले होते. पण आपल्या गोलंदाजांनी धीर न सोडता उत्कृष्ट गोलंदाजी करून त्यांना धावा करू दिल्या नाहीत. हार्दिक पांड्याने टाकलेल्या शेवटच्या शटकातल्या पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरने मारलेला फटका इतका जोरदार होता तो नक्कीच सीमारेषेच्या बाहेर पडेल आणि फलंदाजाला सहा धावा मिळतील असे वाटत होते. तो सिक्सर मिळाला असता तर त्यांनी हा सामना जिंकण्याची शक्यता बरीच वाढली असती. पण आमच्या अणुशक्तीनगरमध्ये वाढलेल्या सूर्यकुमार यादव याने अशक्यप्राय करामत करून  लाँग-ऑफ बाउंड्रीवर एक अविश्वसनीय झेल घेतला. त्याने आधी तो चेंडू हवेत पकडून मागे उडवला  आणि स्वतः मागे उडी मारून तो पुन्हा झेलला आणि सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलले. त्याचा हा कॅच ज्याने पाहिला असेल त्याला हा सामना जिंकून देणारा झेल जन्मभर लक्षात राहील. 

---------------------

आम्ही सारे पणज्या आणि पणजोबा

या वर्षी मी एका बाळाच्या बारशाला गेलो होतो. पूर्वीच्या काळी बारसे हा अगदी घरगुती कार्यक्रम असायचा. त्यात फक्त जवळचे आप्त येत असत आणि साधा समारंभ असायचा. हे बारसे मात्र एका मोठ्या हॉलमध्ये अगदी थाटामाटात साजरे केले गेले.  तो हॉलही पाहुण्यांनी पूर्ण भरला होता. बाळाचा नामकरणविधी साग्रसंगीत पार पडल्यानंतर तिथे आलेल्या सगळ्या पणज्या आणि पणजोबा यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात बाळाचे आजी व आजोबा यांचे काका, मामा, आत्या मावश्या वगैरे सर्वांचा समावेश होता. माझ्यासाठी तरी हा पहिलाच अनुभव होता. 


---------

मी वॉट्सॅपवर एक मजेदार लेख वाचला होता, पण मी त्या वेळी लगेच तो कॉपी करून साठवून ठेवू शकलो नव्हतो, पण तरीही मला तो लेख हवाच होता. काही दिवसांनी वेळ मिळाल्यानंतर मी तो शोधायला सुरुवात केली. पण मी तो लेख कुठल्या ग्रुपवर वाचला होता आणि तिथे तो कुणी पाठवला होता तेही आता आठवत नव्हते. अलीकडे मी अशा गोष्टी लक्षात ठेवतच नाही. मी सात आठ ग्रुपवर धुंडाळून पाहिले, पण प्रत्येक ठिकाणी रोज निदान शंभर नव्या पोस्टी येत असतात. मी त्यातल्या बहुतेक फॉरवर्ड्स वाचतही नाही किंवा डिलीटही करत नाही. काही शहाण्या लोकांनी डिसअॅपिअरिंग मेसेजेस लावलेले असते त्यात त्या आपोआपच विरून जातात. मला हवा असलेला लेख तसा फार जुना नव्हता, तरीही मला तो सापडत नव्हता. अरुंधती दीक्षित हे लेखिकेचे नाव लक्षात होते म्हणून गूगलवर शोध घेतला. तिथे अरुंधती रॉयपासून सप्तर्षींमधल्या अरुंधती ताऱ्यापर्यंत शेकडो अरुंधती निघाल्या, फेसबुकवरील एका अरुंधतीचा मराठी फळाही मिळाला, पण ही अरुंधती वेगळी असावी. 

अखेर वॉट्सॅपवरचा हिरवा ठिपका मला दिसला. मी यापूर्वी त्याचा उपयोग करून पाहिला नव्हता. त्या दिवशी प्रयत्न करायचे ठरवले आणि अरुंधती एवढा एक शब्द लिहिला. 

. . . आणि  अहो आश्चर्यम् ,   मला हवा असलेला लेख क्षणार्धात समोर हजर!

-----------------

अम्मीजान    !!!

साठआठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळी माझी पत्नी अंथरुणाला खिळलेली होती आणि तिच्या सेवासुश्रुषेसाठी तिच्यासोबत एक अटेंडंट असायची. त्या दोघी टेलिव्हिजन पहात असतांना टीव्हीवर कसली तरी जाहिरात लागली होती. ती पाहून माझी पत्नी बोलून गेली, "हे बरे दिसते आहे. आणून पहायला पाहिजे, हे कुठे मिळत असेल?"

"अम्मीजानसे मँगवाइने ना।" ती अटेंडंट बोलून गेली. आम्हा दोघांचीही ट्यूब काही लगेच पेटली नाही. तिला विचारलं,"तुम्हारी अम्मी ये बिजनेस करती है क्या?"

"जी, मेरी अम्मी नही, वो मोबाइलवाला अम्मीजान!" तेंव्हा माझ्या लक्षात आलं की ती अमेझॉन बद्दल बोलत होती.   

त्या काळात 'ऑनलाइन' बाजार इतका बहरला नव्हता. मला तर दुकानात न जाता, तिथली वस्तू डोळ्याने न पाहता विकत घ्यायचा विचारही विचित्र वाटत होता. शिवाय त्याचे पैसे कसे द्यायचे असतील हेसुद्धा समजत नव्हते. आमचे ते घर भरवस्तीत होते आणि पाचदहा मिनिटे चालत गेल्यावर आम्हाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू मिळायच्या.  त्यामुळे मी कधीच असे काही फोनवरून मागवले  नव्हते. त्यावेळी माझ्याकडे असलेला सेलफोन पुरेसा स्मार्ट नव्हता. मी त्यावरून अम्मीजानपर्यंत पोचू शकत नव्हतो. पण अमेझॉन नावाच्या एका परदेशी आणि  काही भारतीय कंपन्यांनीसुद्धा घरबसल्या वस्तू पुरवायच्या सोयी केल्या होत्या असे ऐकत होतो आणि त्यामुळे किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानदारांचा धंदा बसायची भीती आहे असे वर्तमानपत्रात वाचत होतो. तेंव्हा मला ते खरे वाटत नव्हते.

पण काळ झपाट्याने बदलत गेला होता. सन २०२४मध्ये मला इथल्या एका दुकानदाराचा माणूस  लिफ्टमध्ये भेटला. तो मालाची होम डिलिव्हरी करायला आला होता. त्याने सांगितले, "आजकाल सब लोग सभी चीजे ऑनलाइन मँगवा रहे है, हमें तो अपने दुकान का भाडा भी परवडता नही है। "  खरे तर मला त्याच्या दुकानात नेहमीच गर्दी दिसायची, पण तो सांगतो आहे त्या अर्थी त्याला थोडा तरी फटका बसत असणार.  कदाचित घरपोच सामान पोचवणे त्याला पसंत नसेल म्हणूनही त्याचा ऑनलाइन शॉपिंगवर राग असेल.

सगळेच लोक ऑनलाइन खरेदी करायला लागले आहेत हे पाहिल्यानंतर मलाही वाटले की आपल्यालाही निदान हे तंत्र माहीत असायला हवे. मला नवे बनियान घ्यायचे होते. या साध्या वस्तूच्या खरेदीत दुकानात जाऊन तिला प्रत्यक्ष बघण्याची गरज नव्हती आणि झाली तरी त्यात अशी किती फसवणूक होणार आहे? असा विचार करून मी इंटरनेटवर अमेझॉनला गाठले, लगेच त्यांच्याकडल्या असंख्य वस्तूंची नावे, त्यांचे फोटो आणि किंमती अत्यंत आकर्षक पद्धतीने स्क्रीनवर दिसायला लागल्या. त्यातली मला हवी असलेली वस्तू निवडून मी त्यावर टिचकी मारली. त्यावर एक छोटासा फॉर्म समोर आला. मला हे असले फॉर्म भरून ढीगभर माहिती देण्याचा भयंकर कंटाळा आहे, पण या वेळी धीर धरून मी तो भरला आणि मग माझे एक खाते उघडले गेले आणि त्याचाही एक आयडी आणि पासवर्ड लक्षात ठेवण्याचे नवे झंझट मागे लागले. ऑनलाइन पेमेंट कसे करायचे ते ही मला तोपर्यंत समजले होते, त्याप्रमाणे ते केले.   

त्यानंतर मात्र चक्रे फिरत राहिली. "तुमची ऑर्डर स्वीकृत केली आहे", "तुमचा माल पाठवला गेला आहे", "तुमचा माल घरपोच पोचवला गेला आहे", "आम्हाला या सेवेची संधी दिल्याबद्दल आभारी आहोत" असे संदेश येत राहिले आणि मला हवी असलेली वस्तूही रास्त किंमतीत घरबसल्या घरपोच मिळाली. 

------

हिंजवडी, बारामती आणि भोर

साठ वर्षांपूर्वी मी इंजिनियरिंग कॉलेजमधील शिक्षणासाठी तीन वर्षे पुण्यात वास्तव्य केले होते. त्या काळात मला मुंबईच्या वाटेवरील दापोडी, पिंपरी, चिंचवड ही गावे माहीत होती आणि पुणे विद्यापीठाच्या गेटवरून एक रस्ता औंधला आणि दुसरा पाषाणला जातो एवढे माहीत होते. त्यांच्या पलीकडे असलेल्या ग्रामीण भागाची मला कणभरही माहिती नव्हती. पुढे मुंबई पुणे महामार्ग तयार झाल्यानंतर मी बसने पुण्याला जायला लागलो. तेंव्हा वाकड, बालेवाडी, बाणेर, बावधन, वारजे वगैरे नावे समजली. या सगळ्या पूर्वीच्या खेडेगावांमध्ये भरपूर वस्ती वाढून ती आता आधुनिक पुण्याचा भाग झाली आहेत. मुंबईहून पुण्याला जातांना वाकड फाट्यावर उजव्या दिशेला एक लहानसा रस्ता जातांना दिसायचा. या रस्त्यावरून पुढे गेल्यावर दूर कुठेतरी हिंजवडी नावाचे एक गाव आहे, तिथे आयटी पार्क होणार आहे असे ऐकले होते.

पाहता पाहता तो राजीव गांधी इन्फोटेक पार्क तयार झाला. टीसीएस, वायप्रो, टेकएम सारख्या कंपन्यांनी तिथे मोठमोठी ऑफिसे उघडली आणि हजारो इंजिनियर नोकरीला लागले. त्यांना राहण्यासाठी कित्येक टोलेजंग इमारतींची संकुले तयार झाली आणि लोकवस्तीने गजबजून गेली. रस्त्यांवर अनेक अत्याधुनिक हॉटेले, दुकाने, थिएटरे, मॉल्स वगैरेंनी झगमगाट केला. या आधुनिक भागात फिरतांना आपण कुठल्या देशात आलो आहोत असा प्रश्न पडायला लागला.

सध्या माझेही वास्तव्य या भागात आहे. मी निवडणुकीसाठी व्होटर कार्ड काढले तेंव्हा समजले की माझा मतदारसंघ भोर आहे. मी भोर हे नाव पूर्वी ऐकले होते आणि ते पुण्याहून साताऱ्याला जाणाऱ्या रस्त्याच्या आसपास कुठे तरी आहे एवढेच मला समजले होते. आम्ही राहतो तो पॉश शहरी भाग या मुख्यतः ग्रामीण भागात सामील केला गेला आहे  कोण जाणे!  हिंजवडीहून भोर गावाला जातांना वाटेत चिंचवड, कोथरूड आणि खडकवासला हे इतर मतदारसंघ लागतात. पण ते सगळे पार करून गेल्यावर येणारे भोर आणि हिंजवडी हे मात्र एकाच मतदारसंघात आहेत.

मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेंव्हाच मला आमचा भाग बारामती मतदारसंघात आहे असेही समजले होते. बारामती आणि हिंजवडी यांचा तरी कुठे काय संबंध आहे? आमचे सगळे पुणेकर नातेवाईक आणि मित्र पुणे किंवा पिंपरीचिंचवड या शहरांमध्ये राहतात. इथला पिन कोडही पुणे 411056 असा आहे. इथे राहून कॉलेजला किंवा नोकरीवर जाणारे सगळे लोक हिंजवडीच्या बाहेर गेले तर ते पुणे किंवा पिंपरीचिंचवडलाच जातात. बहुतेक लोक बाजारहाटासाठी किंवा सरकारी ऑफिसातल्या कामासाठी तिकडेच जातात तसेच गरज पडली तर तिथल्याच हॉस्पिटलमध्ये जातात. बाहेरगावी प्रवासाला जाण्यासाठी रेल्वे स्टेशन किंवा विमानतळ पुण्यातच आहेत. इतकेच काय, देवदर्शन करायचे असले तरी सगळी प्रसिद्ध किंवा जागृत देवस्थाने पुण्यात किंवा चिंचवड भागात आहेत.  इथे रहाणाऱ्या कुणालाही कधी बारामतीला जायची गरजच पडत नाही. हे प्रसिद्ध झालेले गाव कसे आहे हे पहायलासुद्धा माझ्या ओळखीतला कोणी तिथे गेला नाही. हिंजवडी पुण्याच्या वायव्येला आहे तर बारामती पूर्वेला. म्हणजे तिथे जायचे असेल तर संपूर्ण पुणे शहर आरपार ओलांडून पलीकडे काही किलोमीटर जावे लागते. असे असले तरी निवडणुकीसाठी आमचा भाग पुणे किंवा पिंपरीचिंचवडला न जोडता बारामती मतदारसंघात का ठेवला आहे ते समजत नव्हते.

आमचा बारामतीशी काही संबंध नाही, तिथे जायची काही गरज नाही असे जरी आम्हाला वाटत असले तरी बारामतीकर राजकारणी लोकांना आमची आठवण होती. लोकसभा निवडणुकीला उभ्या असलेल्या माननीय सुप्रियाताई आणि सुनेत्राताई या दोघीही आमच्या कॉलनीमध्ये येऊन आम्हाला भेटून त्यांना मत देण्याचे आवाहन करून गेल्या होत्या. त्यामुळे आम्हाला जरा बरे वाटले होते. 

पण नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी असलेल्या भोर मतदारसंघातल्या दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना आमच्याकडे यायची गरज वाटली नाही. घरोघरी जाऊन पत्रके वाटणारे कार्यकर्तेही आमच्या भागात फिरकले नाहीत. सभा, मिरवणुका वगैरे काहीही नाही. तिथे निवडणुकीचे वारेच पोचले नव्हते. मला तर या वेळी आपण अमेरिकेत रहात आहोत की काय असे वाटायला लागले होते. पण तरीही मी निवडणूक केंद्रावर जाऊन मतदान करून आलो.

-   

जगज्जेते

पूर्वीच्या काळात भारतातले काही सम्राट अश्वमेध यज्ञ करायचे. त्यासाठी मोकाट सोडलेल्या घोड्याला कुणीही आडकाठी केली तर त्या सम्राटाचे सैन्य युद्ध करून त्याचा पराभव करायचे. अशा रीतीने तो घोडा त्या काळात माहीत असलेल्या सगळ्या जगात फिरून परत आला तर  त्या राजाने सगळे जग जिंकले असे समजले जायचे. इतिहासकाळात ग्रीसमधल्या अलेक्झँडर या राजाने सगळे जग जिंकायचे असे ठरवले आणि तो आपले बलाढ्य सैन्य घेऊन पूर्वेच्या दिशेने निघाला. मध्यपूर्वेतील सगळ्या राजांना हरवून तो भारतापर्यंत आला, पण इथे आपली डाळ शिजणार नाही हे ओळखून परत जायला निघाला आणि वाटेतच मरण पावला.  तरीही काही पाश्चात्य इतिहासकार त्याला जगज्जेता म्हणतात. पूर्वीच्या काळात फक्त लढाईमधूनच जिंकणे आणि हरणे होत असावे. 

शेदीडशे वर्षांपूर्वी जागतिक स्तरावर क्रीडास्पर्धा व्हायला लागल्या आणि त्यात जो पहिल्या नंबरावर येईल त्याला विश्वविजेता किंवा जगज्जेता या पदाचा मान दिला जायला लागला. इतर बहुतेक खेळांमधले सगळे क्रीडापटु एका ठिकाणी जमून सामने खेळतात आणि त्यात जो अजिंक्य राहतो तो त्या खेळासाठी जगज्जेता ठरतो, पण बुद्धीबळाच्या बाबतीत थोडी वेगळी पद्धत आहे. यात तत्कालिन जगज्जेता वगळून इतर खेळाडू आधी एकमेकांबरोबर खेळतात आणि त्यांच्यात सर्वश्रेष्ठ ठरलेला खेळाडू जगज्जेत्याला आव्हान देतो. मग त्या दोघांमध्ये दीर्घकाळ चालणारे अनेक सामने होतात आणि त्यात जो जिंकतो तो जगज्जेता होतो. दुसरा कोणी त्याला आव्हान देऊन हरवेपर्यंत तोच जगज्जेता म्हणवला जातो.  

मला समजायला लागल्यापासून अनेक वर्षे कोणीतरी रशियन माणूसच बुद्धिबळातला जगज्जेता असायचा. बॉबी फिशर या अमेरिकन माणसाने त्यांचा एकाधिकार संपवून हा खिताब जिंकला, पण कारपोव्ह आणि कॅस्पारोव्ह यांनी पुन्हा रशियाचे वर्चस्व सिद्ध केले. सन २००७मध्ये विश्वनाथन आनंद या भारतीयाने हे जगज्जेतेपद मिळवून इतिहास घडवला. त्याने हे पद सहा वर्षे आपल्याकडे ठेवले. सन २०१३मध्ये मॅग्नस कार्लसन याने आनंदला पराभूत करून हे पद जिंकले. २०२२मध्ये तो अपराजित असतांनाच त्याने हे पद सोडले आणि इतर उत्सुक खेळाडूंना हरवून मागच्या वर्षी चीनचा डिंग वॉन जगज्जेता झाला.

विश्वनाथन आणि कार्लसन यांचा चेन्नै इथे झालेला सामना पहाणाऱ्या प्रेक्षकांमध्ये एक  लहानसा भारतीय मुलगा होता, तो तेंव्हा थोडा उदास झाला होता, पण या महत्वाकांक्षी मुलाने बुद्धीबळाचा ध्यास घेतला. तो बद्धिबळ खेळत राहिला आणि सामन्यामागून सामने जिंकत राहिला. २०२४ या वर्षी त्याने इतर खेळाडूंना हरवून डिंगला आव्हान दिले आणि सिंगापूरमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्याच्या अखेरच्या डावात विजयश्री खेचून आणली, त्याचे नाव आहे गुकेश दोम्माराजू. अवघ्या अठरा वर्षांचा असतांना बुद्धिबळातला जगज्जेता झालेला हा सर्वात लहान चँपियन आहे. गुकेशचे मनःपूर्वक अभिनंदन. 

मी असे वाचले होते की गुकेशला सुमारे साडेअकरा कोटी रुपये बक्षिस मिळणार आहेत. त्यातले साडेचार कोटी रुपये आयकर भरावा लागेल. तामिळनाडु सरकारने पाच कोटी रुपये बक्षिस जाहीर केले आहे. आणखी कोण कोण त्याला किती बक्षिसे देणार आहेत हे काही दिवसात कळत जाईल. त्यातून त्याला किती कर भरायचा आहे हे ठरवण्यासाठी त्याला आधी एक टॅक्स कन्सल्टंट शोधावा लागेल.


जगज्जेते -२

 इंग्लंडचे साम्राज्य जगभरात सर्वात जास्त पसरलेले होते. त्यावर कधीही सूर्य मावळत नाही अशी प्रौढी मारली जात होती. इंग्रज लोकांनी लढाईत जिंकलेल्या राजांचे खजिने लुटून आणि प्रजेवर कर लावून संपत्ती गोळा केलीच, शिवाय वसाहतींमधला कच्चा माल आपल्या देशातल्या कारखान्यांना पुरवून आणि तिथे तयार झालेला पक्का माल जगभर अवाच्या सवा भावाने विकून त्या व्यापारामधूनसुद्धा ते आणखी संपत्ती मिळवत गेले.  यामधून ब्रिटन हा जगातला सर्वात संपन्न देश आणि लंडन हे सर्वात समृद्ध शहर झाले होते आणि तिथला राजा किंवा राणी सर्वात  जास्त श्रीमंत आणि शक्तिशाली व्यक्ती झाली होती. 

विसाव्या शतकात सगळीकडे लोकशाहीचे वारे पसरले आणि इंग्लंडमधले राजे नुसते नामधारी राहिले. दोन महायुद्धांमध्ये त्या देशाची बरीच वाताहात झाली आणि त्याला साम्राज्यामधल्या सगळ्या देशांना स्वातंत्र्य द्यावे लागले.  अमेरिकेने म्हणजे यूएसए या देशाने शेती, कारखानदारी, सैनिकी सामर्थ्य आणि व्यापार या सर्व क्षेत्रांमध्ये प्रचंड वेगाने घोडदौड करून तो जगातला सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली देश झाला आणि गेली कित्येक दशके राहिला आहे.  पण तिथला राष्ट्राध्यक्ष दर चार वर्षांनी बदलत असतो. तेवढ्या काळात तो सत्ताधीश असतो पण तो सर्वात श्रीमंत माणूस नसतो. किंबहुना त्या देशातला सर्वात श्रीमंत माणूस आपल्या उद्योगधंद्यात मग्न असतो, तो राष्ट्राध्यक्ष होण्याच्या शर्यतीत भाग घेत नाही.

 फोर्ब्स कंपनीने प्रसिद्ध केलेली सन १९००सालापासून जगामधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची नावे उपलब्ध आहेत.  ही यादी तयार करतांना देशोदेशीचे महाराजे, सुलतान, हुकुमशहा वगैरेंचा विचार केला जात नाही. तसेच ही संपत्ती ठरवतांना त्या माणसाकडे असलेल्या शेअर्सची बाजारातली किंमत विचारात घेतली जाते आणि ती दररोज कमीजास्त होत असते. सध्याच्या युगात उद्योगधंद्यामधून संपत्ती निर्माण होते आणि वाढत जाते. यामुळे   या यादीत कार्नेजी, रॉकेफेलर, फोर्ड, गेट्टी आदि अमेरिकन कारखानदारांची नावे आहेत.  विसाव्या शतकाच्या अखेरीला संगणक उद्योगाने कमालीच्या वेगाने प्रगती केली आणि मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्सने श्रीमंतीचे शिखर गाठले. तो सलग वीस वर्षे त्या स्थानावर टिकून होताच, आजही त्याच्या आसपास आहे. अॅमेझॉन या व्यापार करणाऱ्या सर्वात मोठ्या जागतिक कंपनीचा मालक जेफ बेझोस याने बिलगेट्सची जागा घेतली होती. बर्नार्ड आर्नोल्ड नावाचा एक फ्रेंच माणूस काही दिवस टॉपवर होता, पण गेली काही वर्षे सतत ठळक बातम्यांमध्ये असणारा एलॉन मस्क हा सध्या जगामधला सर्वाधिक श्रीमंत माणूस झाला आहे. इतकेच नव्हे तर आतापर्यंत जितके सर्वात श्रीमंत लोक होऊन गेले त्या सर्वांच्यापेक्षा मस्कची आजची संपत्ती जास्त आहे असेही बातमीमध्ये म्हंटले आहे.  

 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------



वर्ष २०२५


२०२५: आकड्यांच्या दुनियेतील एक 'मॅजिकल' वर्ष! गणिताच्या भाषेत सांगायचे झाले तर, प्रत्येक आकड्याचे स्वतःचे एक व्यक्तिमत्व असते. पण २०२५ हे वर्ष संख्याशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत देखणे आणि शिस्तबद्ध आहे. या संख्येमध्ये लपलेली गणितीय जादू पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

१. घन आणि बेरीज यांचा सुंदर संगम: गणितात १ ते ९ या अंकांच्या घनाची (Cubes) बेरीज केली, तर त्याचे उत्तर अचूक २०२५ येते.1^3 + 2^3 + 3^3 + 4^3 + 5^3 + 6^3 + 7^3 + 8^3 + 9^3 = 2025

२. स्वतःची फोड आणि स्वतःचाच वर्ग: २०२५ ची एक गमतीदार फोड करून पहा. या संख्येचे दोन भाग करा: २० आणि २५.आता यांची बेरीज करा: 20 + 25 = 45.आणि जर तुम्ही ४५ चा वर्ग केला तर उत्तर पुन्हा २०२५ येते! अशा प्रकारचा गुणधर्म खूप कमी संख्यांमध्ये आढळतो.

३. त्रिकोणी संख्यांशी नाते : त्रिकोणी संख्या' (Triangular Numbers) म्हणजे अशा संख्या ज्या ठिपक्यांच्या साहाय्याने एक समभुज त्रिकोण तयार करू शकतात. ९ वी त्रिकोणी संख्या ४५ आहे (कारण 1+2+3+4+5+6+7+8+9 = 45). २०२५ हा याच ४५ चा वर्ग आहे. म्हणजेच, पहिल्या नऊ घनांची बेरीज ही ९ व्या त्रिकोणी संख्येच्या वर्गाइतकी असते.

४. शेवटचा आकडा ५ असण्याचे वैशिष्ट्य: ज्या संख्यांच्या शेवटी ५ असतो, त्यांचा वर्ग काढण्याची एक सोपी पद्धत आहे. ४५ चा वर्ग काढताना: शेवटच्या ५ चा वर्ग २५ लिहा. उरलेला अंक ४ आहे, त्याला त्याच्या पुढच्या अंकाने (५) गुणा: 4 times 5 = 20. दोन्ही एकत्र करा: २०२५.

५.२०२५ हा आकडा दोन  वर्गांचा गुणाकार आहे  5^2X9^2 = 25X81 =2025

६. २०२५ हा आकडा तीन किंवा चार वर्गांची बेरीज आहे. 40^2=1600, 20^2=400, 5^2=25, 3^2=9 and 4^2=16.. . . 1600+400+25 आणि 1600+400+16+9 =2025 

एक लेखक म्हणून जेव्हा आपण शब्दांशी खेळतो, तेव्हा कधीकधी या आकड्यांच्या खेळाकडे पाहणेही तितकेच आनंददायी असते. २०२५ हे केवळ एक वर्ष नसून निसर्गातील आणि गणितातील समतोलाचे एक उत्तम उदाहरण आहे.


इसवी सन २०२५च्या आठवणी -१

१ जानेवारी २०२५ला मी माझ्या कुटुंबियांसह  श्रीगजाननमहाराजांच्या शेगावला होतो. त्यामुळे त्या वर्षाची सुरुवात मंगलमय आणि भक्तिरसपूर्ण झाली होती.  जानेवारीच्या मध्याला मी आमच्या कॉलनीमधल्या 'आनंदयात्री' या ज्येष्ठ नागरिकांच्या समूहाबरोबर यवतजवळील दरेकर वाड्यातल्या हुरडा पार्टीला गेलो होतो, तिथे खाणेपिणे, गाणी गाणे, खेळ, मौजमस्ती आणि धमाल केली होती. त्यानंतर महिना अखेरीला माझे मुंबईत राहणारे एक आप्त अरुण पटवर्धन मला पुण्याला येऊन भेटून गेले. पन्नास वर्षांपूर्वी आमचे एकमेकांकडे बरेच जाणे येणे होत होते. पुढे दोघेही आपापल्या क्षेत्रात अधिकाधिक गुंतत गेल्यामुळे आमच्या भेटणे कमी होत होत थांबून गेले होते. पण या वर्षी आमच्या भेटीचा योग आला होता. 

इंग्लंडमध्ये फार चांगली सार्वजनिक आरोग्यसेवा आहे. तिला कार्यक्षम ठेवणाऱ्या डॉक्टरांमध्ये अनेक भारतीय वंशाचे आहेत. त्यातच आमच्या जमखंडीचे डॉ.रवी आपटे आहेत. इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले पण मराठी भाषेवर मनापासून प्रेम करणारे डॉ.बाळ ऊर्फ रविंद्र विश्वनाथ आपटे तिकडे राहूनही विविध विषयांवर मराठी भाषेत पुस्तके लिहितात आणि ती भारतात छापून घेऊन प्रकाशित करतात. २०२५ या वर्षी ते भारतात आलेले असतांना त्यांनी आपण होऊन माझ्या घरी येऊन माझी भेट घेतली आणि तासभर मनमोकळ्या गप्पा मारल्या.  वयाने तसेच अनुभव आणि ज्ञान या सगळ्याच बाबतीत मला ज्येष्ठ असलेल्या या बाळदादांनी माझ्यासारख्या अनोळखी, अप्रसिद्ध आणि कनिष्ठ व्यक्तीला भेटायची इच्छा का व्यक्त करावी याचे मला कुतूहलच होते. पण गप्पा मारता मारता माझ्या हे लक्षात आले की आम्हा दोघांची व्यावसायिक क्षेत्रे पूर्णपणे भिन्न असली तरी आमच्या स्वभावात काही साम्यस्थळे आहेत. "काय, कुठे, केंव्हा, कसे याबद्दलचे प्रचंड कुतुहल व जिज्ञासा यांची सुंदर सांगड घातली गेल्यामुळे सर्वच विषयांकडे पाहण्याची दृष्टी बदलून गेली." असे त्यांचे मनोगत एका पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये लिहून ते पुढे लिहितात, "आपणास जे नवीन आणि निश्चित ठाऊक आहे ते लिहून, लहान थोरांना सांगून त्यांची जिज्ञासा वाढवावी या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे."  कदाचित अशाच प्रकारच्या विचारांचे काही कण जमखंडीच्या मातीमधून माझ्यातही उतरले असावेत म्हणून माझ्या परीने मी चार ओळी लिहित असतो, त्या योगायोगाने त्यांच्या वाचनात आल्या असाव्यात. या वेळी त्यांनी मला भेटून त्यांचे 'अनाहत' हे नवे पुस्तक मला भेट दिले आहे. निरनिराळ्या विषयांवरील अनेक सुंदर लेखांचा हा एक वाचनीय असा संग्रह आहे. या वर्षी मला मिळालेला हा एक अनमोल असा आशीर्वाद आहे.

इसवी सन २०२५च्या आठवणी -२

मी रायगडाबद्दल असंख्य वेळा वाचले आणि ऐकले होते, त्यामुळे हा किल्ला पहायची उत्सुकता होती. ती इच्छा यावर्षी पूर्ण करून घेतली. आम्ही सकाळी लवकर निघून कारने रायगडावर जाणाऱ्या रोपवेच्या स्टेशनला पोचलो आणि त्या झोपाळ्यात बसून गडावर गेलो. मला काठी टेकत चालत येतांना पाहून एक शिलेदार पुढे आला तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही पालखीत बसवून गड दाखवून आणू असे सांगितले. तिथे जवळजवळ दोनशे पायऱ्या चढाव्या उतराव्या लागतील असे त्याने सांगितले.   ते काम मला बरेच अवघड वाटले आणि मध्येच मला दम लागला असता तर सगळ्या प्रोग्रॅमचा विचका झाला असता. शिवाय माझ्या गतीने थांबत थांबत चालायचे झाल्यास सगळ्यांनाच खूप जास्त वेळ लागला असता म्हणून आम्ही थोडा विचार केला आणि पालखी ठरवली. त्याने आणलेली पालखी हॉस्पिटलमधल्या स्ट्रेचरसारखी दिसत होती आणि एकजण पुढे आणि दुसरा मागे उभा राहून त्याच्या दांड्यांना उचलत होता.  त्या पालखीचे वजन आणि त्यात बसलेल्या उतारूचे वजन उचलून त्या गडाच्या उंच पायऱ्या चढणे कठीण काम होते, पण ते मावळे जिद्दीने करत होते. मला त्यांची दमणूक दिसत होती म्हणून सपाट जागा आल्यावर मी मधून मधून पालखीतून उतरून थोडे थोडे अंतर चालत जायचे ठरवले. असे करत मुख्य भाग पाहून घेतल्यानंतर मी एका ठिकाणी बाकड्यावर बसून घेतले. मुलगा आणि नातवंडे दूर दूरची ठिकाणे पाहून आले.  तिथे एके काळी बांधलेल्या भव्य महालांचे आता काही अवशेषही शिल्लक नाहीत.  रिकाम्या जागांवरच इथे अमूक महाल आणि तिथे अमूक महाल असे सगळे सांगितले जाते. त्याने मनाचे समाधान होत नाही.  पर्यटकांसाठी त्या भागात कुठेतरी एखाद्या ऐतिहासिक सिनेमाच्या सेटसारखे महाल उभे करून ठेवले असते तरी ते पहायला मजा आली असती. 

आमच्या मित्रमंडळींमधल्या ज्यांचे वाढदिवस होऊन गेले होते त्यांनी मिळून व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी वाकडमध्ये नव्याने उघडलेल्या एका हॉटेलात पार्टी दिली होती. सगळ्यांनी मिळून हसत खेळत आणि गाणी म्हणत केलेल्या या स्नेहभोजनाने मैत्रीचे संबंध जास्त मजबूत झाले.


इसवी सन २०२५च्या आठवणी -३

मला आमच्या नात्यातल्या एका समारंभासाठी एरंडवणे भागातल्या बोगनविला फार्ममध्ये जायचे होते कारण दूरदूरहून येणारे काही आप्त मला तिथे एकत्र भेटणार होते. मी या जागेचे नावही कधी ऐकले नव्हते त्यामुळे ती नेमके कुठे आहे याची मला काही कल्पना नव्हती.  गूगलवरून शोध घेतला तर मी मुळा नदीच्या किनाऱ्यावर हिंजवडीला राहतो तिथून मुठा नदीच्या किनाऱ्यावरील कुठल्याशा जागी जायचे होते इतका अंदाज आला. दहापंधरा वर्षापूर्वीच्या काळात मी यासाठी घरातून निघाल्यावर आधी चालत चालत एक किलोमीटरावर असलेल्या ऑटोरिक्शा स्टँडवर जाऊन तिथून हिंजवडीच्या बसस्टॉपपर्यंत जाण्यासाठी रिक्शा घेतली असती. तिथून मला मनपाला जाणारी बस मिळाली असती. तिथून दुसऱ्या बसने नळ स्टॉपपर्यंत जाऊन पुढे पत्ता शोधत शोधत त्या जागेवर पोचेपर्यंत दीड दोन तास वेळ गेला असता आणि मी दमून घामाघूम होऊन गेलो असतो. कार्यक्रम संपल्यावर घरी परत येण्यासाठी पुन्हा ही सगळी त्रिस्थळी यात्रा करावी लागली असती. माझ्या सध्याच्या शारीरिक क्षमतेमध्ये तर एवढी दगदग करणे मला शक्यच नव्हते, त्यामुळे मी तिथे जायचा विचारही केला नसता.

पण आता तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे परिस्थिती किती बदलली आहे पहा! मी कपडे घालून तयार झाल्यावर हातातल्या मोबाइलवर दोन चार बटने दाबली, कुठे जायचे त्या जागेचे फक्त नाव टाकले आणि क्षणभरात माझ्यासाठी एक कॅब बुक झाली. लिफ्टमधून खाली आल्यावर दोन तीन मिनिटात ती समोर येऊन उभी राहिली. माझ्या घरापासून कुठकुठल्या रस्त्यांवरून जाऊन त्या पत्त्यावर पोचायचे आहे याचे सगळे मार्गदर्शन त्या गाडीचालकाचा त्याच्या मोबाइलवर दिसत होते. त्याप्रमाणे जाऊन त्याने मला त्या बोगनविला फार्मच्या गेटपाशी नेऊन सोडले. त्यानंतर मी पुन्हा माझ्या मोबाइलवर दोन चार बटने दाबली आणि त्याला भाड्याचे पेमेंट केले. तीसपस्तीस मिनिटे कारमध्ये आरामात बसून काढून मी त्या ठिकाणी जाऊन पोचलो आणि पूर्ण उत्साहाने तिथल्या कार्यक्रमात सहभागी झालो, सगळ्या पाहुणेमंडळींना भेटून त्याच्याशी वार्तालाप केला. सुग्रास भोजन केले आणि दुसरी कॅब बोलावून आरामात घरी परत आलो. गूगल, ओलाअॅप, जीपीएस आणि यूपीआय यांनी जीवन किती सोपे केले आहे ना?

. . . . . . ..

सध्या अमेरिकेत राहणाऱ्या माझ्या मुलाला असे वाटत असते की मी त्याच्याकडेही रहायला जावे, पण मी या वयात सामान उचलून प्रवास करू शकत नाही. म्हणून तोच इकडे येऊन मला घेऊन जातो. या वर्षी उन्हाळ्यात मला त्याच्याकडे जायचे आहे असे  तो कधीपासून म्हणत होताच. त्याने या एप्रिल-मे मध्ये प्रवास करायचा बेत ठरवून मला तयार रहायची सूचना केली.  मला कुठला आजार नव्हता, माझा रक्तदाब आणि रक्तातल्या साखरेचे प्रमाण नियंत्रणाखाली होते तरीही माझ्या अंगातली शक्ती हळू हळू कमी होत चालली आहे अशी एक जाणीव होत होती. 

आमच्या डॉक्टर मित्राने काही तपासण्या सुचवल्या त्या नॉर्मल आल्या, मग त्याने प्रोटीन्स आणि जीवनसत्वे घ्यायला सांगितली. ओळखीतल्या दुसऱ्या एक डॉक्टरीणबाई दहा बारा वर्षे परदेशात राहून वृद्धांचे आजार यावर काम करून आल्या आहेत. त्याच्याकडे गेल्यावर त्यांनी मला न्यूरॉलॉजिकल, कार्डिअॅक आणि  ऑर्थोपीडिक इव्हॅल्युएशन करून यायला सांगितले.  मी धायरीला रहात असतांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलात अनेक वेळा जाऊन अशा प्रकारच्या चाचण्या केल्या होत्या. त्या सगळ्यांचा निष्कर्ष असा होता की वयोमानानुसार शरीरात काही बदल होत असतात, त्यावर काही औषधे नाहीत. नियमित आहार, व्यायाम आणि विश्रांती घेऊन आपणच आपली क्षमता टिकवून ठेवायचा प्रयत्न करायला पाहिजे. ते सगळे तर मी करत होतोच.  हिंजवडीला राहून शहरातल्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन या चाचण्या करणे जास्तच अवघड काम होते आणि त्यातून काही उपाय निघायची शक्यता धूसर होती.

अमेरिकेला जाण्यापूर्वी मी रक्ततपासणी करून ते रिपोर्ट घेऊन माझ्या कार्डिओलॉजिस्टकडे गेलो. त्याने एक टूडीएको टेस्ट करून मला प्रवास करायला काही हरकत नाही,  हातापायातला अशक्तपणा कदाचित सार्कोपीनियामुळे असेल. त्यावर उपाय म्हणून त्यांनी फिजिओथेरपी घ्यायला सांगितले. मी लगेच एका फिजिओथेरेपिस्टला गाठले. तिने घरी येऊन पंचवीस प्रकारचे व्यायाम सांगितले आणि दहा बारा दिवस ते माझ्याकडून करवून घेतले. त्यात झोपून, बसून आणि उभे राहून हातापायांचे एक एक सांधे वाकवायचे आणि पाच पाच सेकंद त्या अवस्थेत धरून ठेवायचे असतात. ते रोज करून माझे काही स्नायू जरा बळकट झाले आणि माझ्या अंगातली शक्ती हळू हळू वाढायला लागली आहे असे वाटले. तोपर्यंत प्रवासाला जायची वेळ आलीच.


इसवी सन २०२५च्या आठवणी -४

या वेळी माझे अमेरिकेला जाणे एप्रिलमध्ये ठरले, त्या वेळी सगळीकडे सामसूम होते. कमी दगदग व्हावी म्हणून आमचे पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते नेवार्क असे डिजिटल तिकीट काढले गेले. पण महिनाअखेरपर्यंत वातावरण तापत गेले आणि कधीही काही गंभीर घटना होऊ शकेल अशी भीती पडली. या अनिश्चिततेमुळे मी माझ्या मित्रांना आणि आप्तांना माझ्या परदेश प्रवासाबद्दल काही सांगितलेच नाही.  मी सांगितले असते तर बहुधा त्यांनी मला नाउमेद केले असते. सात मे ला संघर्ष सुरू झाल्यावर आम्ही सगळ्या बातम्या जास्तच लक्ष देऊन ऐकायला लागलो. आधी असे समजले की दिल्लीहून अमेरिकेला जाणारे विमान मार्ग बदलून गेले आणि सहा सात उशीराने तिकडे जाऊन पोचले. पुण्यातल्या घरातून निघून अमेरिकेतल्या घरी पोचेपर्यंत नाही तरी २४-२५ तास लागणार होतेच याची मनाची तयारीही होती. त्याऐवजी ३०-३२ तास लागतील एवढेच असे वाटले.

पण माझा प्रवास ११ तारखेला होणार होता आणि ९ तारखेला देशातली एकंदर परिस्थिती जास्त तणावपूर्ण होती. काही शहरांमध्ये संभाव्य विमानहल्ल्याला तोंड देण्याच्या नागरिकांच्या तयारीच्या चाचण्या घेण्यात येत होत्या. त्या दिवशी सकाळी चौकशी केल्यावर असे समजले की दिल्ली विमानतळावरील त्या दिवसातली ऐंशी उड्डाणे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे  ११ तारखेच्या आमच्या उड्डाणाबद्दल मनात शंका निर्माण झाली. आम्ही पुण्याहून दिल्लीला गेलो, पुढले विमान रद्द झाले आणि तिथली स्थानिक परिस्थिती जास्तच चिघळली तर आम्ही कुठे जाणार होतो? काय करणार होतो? त्यापेक्षा मुंबईला जाऊन तिथून अमेरिकेला गेलेले बरे असे वाटले.  मग ज्या एजन्सीकडून विमानाची तिकीटे घेतली होती त्यांना फोन करून चौकशी केली. त्यांनी सांगितले की आधीचे बुकिंग रद्द करण्याची काही कँसलेशन फी द्यावी लागेल आणि आयत्या वेळी मुंबईहून नेवार्कच्या तिकीटाचा दरही आता जास्त असेल त्याचे जास्तीचे पैसे द्यावे लागतील असा दुहेरी  धक्का होता, पण दिल्लीला जाणे टाळायचे असेल तर तो सोसायला पाहिजे म्हणून आम्ही होकार दिला, पण थोड्या वेळानंतर त्यांनी सांगितले की हा बदल करण्यासाठीसुद्धा त्यांना एअरलाइन्सचा फोनच मिळत नाही आहे, तुम्हाला जमलं तर तुम्ही प्रयत्न करा. आम्हीही प्रयत्न करून पहात होतो, पण तो फोन लावल्यानंतर आणि "हे बटन दाबा", "ते बटन दाबा" वगैरे सोपस्कार केल्यानंतर संवाद पुढे सरकतच नव्हता. त्या दिवशी अनेक उड्डाणे रद्द झाल्यामुळे त्यांना हजारोंच्या संख्येने फोन येत असतील तर त्याला ती फोनची यंत्रणा तरी काय करणार? त्यामुळे त्या वेळी आम्हाला काहीच करता येत नव्हते. बहुतेक माझी ही ट्रिप रद्द होणार की काय असे दिसायला लागले होते. मी तरी अमेरिकेत जाऊनसुद्धा कुठले मोठे काम करणार होतो? या आधी ही माझे जगभर फिरणे झालेले होतेच. त्यामुळे मलाही या वेळी जायची मनापासून फार ओढ नव्हतीच. पुढे जे होईल ते पहावे असा विचार केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी इंटरनेटवर फ्लाइटची चौकशी करता अशी माहिती मिळाली की विमानांचे टाइमटेबल तात्पुरते बदलले असून आमचे विमान दिल्लीहून आम्हाला दिलेल्या वेळेच्या ५-६ तास आधीच सुटणार आहे. तसे असेल तर आमच्या पुण्याहून निघणाऱ्या फ्लाइटने दिल्लीला जाऊन ती पुढील फ्लाइट गाठणे शक्यच नव्हते.  पण हा बदल एअरलाइन्सने केलेला असल्यामुळे आम्हाला कँसलेशन चार्ज न लागता ते तिकीट रद्द करता येणे शक्य होईल असे वाटले.  एजन्सीला ई मेल पाठवून खात्री करून घेतली आणि मग मुंबईहून निघणाऱ्या दुसऱ्याच एअरलाइन्सचे तिकीट काढले. यातली एक गंमत म्हणजे ते तिकीट रद्द केलेल्या तिकिटापेक्षा जराशा कमी किंमतीत मिळाले. त्या परिस्थितीत दिल्लीला जाण्यातला धोकाही टळला आणि थोडे पैसेही वाचले. मात्र या नव्या तिकिटासाठी आधी संपूर्ण किंमत भरावी लागली. कँसलेशनचे पैसे कधी मिळतील तेंव्हा मिळतील, पण आधी तर दुप्पट खर्च करावा लागला.

इसवी सन २०२५च्या आठवणी -५

मी पंधरा वर्षांपूर्वी अमेरिकेतला स्वातंत्र्यदेवीचा पुतळा तिच्या बेटावर जाऊन अगदी जवळून पाहिला होता. या वर्षी अमेरिकेत गेल्यावर पहिल्याच आठवड्यात न्यू जर्सीतल्या जर्सी सिटीमध्ये असलेल्या लिबर्टी पार्कमध्ये गेलो. हे पार्क म्हणजे एक प्रचंड आकाराचे लॉन आहे. त्यात रस्त्यांच्या कडेकडेला बसायला काही बेंच ठेवले आहेत. काही लोक तिथे येऊन जॉगिंग करत असतात, काही लोक पिकनिक करायला येतात. आम्ही तिथे गेलो तेंव्हा फारच तुरळक लोक दिसत होते, पार्किंगमध्येही सगळी रिकामीच जागा होती. या पार्कच्या एका भागातून खाडीच्या पलीकडे असलेला स्वातंत्र्यदेवीचा पुतळा आणि मॅनहॅटनमधल्या टोलेजंग इमारती यांचे दर्शन होते.



न्यूजर्सीमधील  मराठी विश्व या संस्थेने इथल्या पिस्कॅट्वा गावाजवळच्या एका पार्कमध्ये गावजत्रा या नावाने एक पिकनिक आयोजित केली होती. तिथे  आमच्या भागातल्या लहान बाळांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातले मराठी खूप लोक उत्साहाने आले होते. आयोजकांनी तिथे खाण्यापिण्याची बऱ्यापैकी सोय ठेवली होती पण ज्यांना पाहिजे असेल त्यांनी त्यांना पाहिजे असलेले पदार्थ आधीपासूनच मागवून ठेवणे आवश्यक होते. आयत्या वेळी काही कमी पडले किंवा शिल्लक राहिले आणि वाया गेले असे होऊ नये याची काळजी घेतली होती. आम्हाला हे ठाऊकच नव्हते म्हणून आम्ही घरून जेवण करूनच तिथे गेलो होतो.

या निमित्याने ओळखीच्या मराठी लोकांच्या एकमेकांशी भेटी व्हाव्यात आणि काही नव्या ओळखी व्हाव्यात हा मुख्य उद्देश होता. त्यानुसार लोक एकमेकांना भेटून गप्पा मारत होते. माझ्यासारख्या भारतातून गेलेल्या पाहुण्यांना तिथले कोणी ओळखीचे लोक भेटण्याचा प्रश्नच नव्हता. तिथे सामूहिक खेळ, नाच गाणी वगैरे चालले होते, त्यातही ज्यांना हौस असेल त्यांनी सहभागी व्हावे, नसेल त्यांना बसायला जागा ठेवल्या होत्या. तरुण मंडळी अर्थातच उत्साहाने सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत होती. आम्ही चार बुजुर्ग एका बाकड्यावर बसून  गप्पा मारता मारता तिथे चाललेली मजा पहात होतो. त्यातले तीघेजण प्रवासी आणि एक निवासी होता. बोलता बोलता आमची मैत्री जमली आणि नंतर संपर्कात राहण्यासाठी आम्ही एक वॉट्सॅप ग्रुपही तयार केला.


महाराष्ट्रामध्ये आषाढी वारीसाठी भाविक वारकरी पंढरीच्या वाटेवर चालत जातात. आळंदी आणि देहूहून निघालेल्या वाऱ्या मधल्या काही मुक्कामांमध्ये रिंगण घालतात.   न्यूजर्सीमधल्या आमच्या भागातल्या मराठी लोकांनी एका पार्कवर जमून एक प्रतीकात्मक रिंगण घातले होते. त्याला खूप लोक हजर राहिले होते. त्यातल्या बहुतेक पुरुषांनी भारतीय पोशाख घातला होता, निदान अंगात टी.शर्टच्या ऐवजी कुर्ता घातला होता. महिलांमध्ये भारतीय वस्त्रांची फॅशन परेड होती. कुणी तर नऊवारी लुगडे, नाकात नथ, केसांचा अंबाडा घालून, त्यावर फुलांचा गजरा माळून आल्या होत्या.  लहान लहान मुलामुलींनाही निऱ्या करून शिवलेले रेडीमेड धोतर किंवा साडी 'घातली' होती. एका लहान रिंगणामध्ये ढोलताशांच्या गजरात अनेक लोक लेझिम खेळत होते आणि फुगड्या घालत होते तर एका खूप मोठ्या रिंगणामध्ये शेकडो लोक "विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल" च्या तालावर चालत चालत फेऱ्या घालत होते. एका ठिकाणी विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती ठेवल्या होत्या. रिंगणाचा कार्यक्रम संपल्यावर सर्वांनी रांगेत उभे राहून त्यांचे दर्शन घेतले. सर्वांना प्रसादाचे पुडके मिळाले. त्या दिवशी तिथे बरेच ऊन होते तरी लोक उत्साहाने आले होते. त्यांच्यासाठी थंडगार लिंबू सरबत विनामूल्य वाटत होते. शिवाय एक आयस्क्रीमवाल्याची गाडी आली होती, त्यांचा धंदाही जोरात चालत होता. अमेरिकेत एक भारतीय आणि त्यातूनही खास मराठी लोकांचा मेळावा पाहून मजा आली.  



मी अणुशक्तीनगरमध्ये रहात असतांना आमच्या समोरच्या घरातच माझा ऑफिसमधला सहकारी मित्र अरविंद देशपांडे रहात होता. त्याची धाकटी मुलगी पिंकी तेंव्हा शाळेत शिकत होती. पुढे तिने इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आणि ती लग्न करून अमेरिकेला गेली. त्यानंतर कधीच तिची भेट झाली नव्हती. पण मी अमेरिकेला आलो आहे हे तिला कुणाकडून तरी समजले आणि तिने माझ्या मुलाशी संपर्क करून आम्हाला तिच्या घरी भेटायला यायचे आमंत्रण दिले. कनेक्टिकट राज्य तसे न्यूजर्सीहून जास्त दूर नाही म्हणून आम्हीही तिच्याकडे जायचे ठरवले.  जीपीएस लावून आम्ही गाडीने निघालो. का कुणास ठाऊक, पण त्या यंत्राने आम्हाला हायवे सोडून लहान रस्त्यांवरून न्यायचे ठरवले.  त्या ग्रामीण भागातले अनुपम सृष्टीसौंदर्य पहात वळणा वळणांच्या रस्त्याने जात असतांना मध्येच कुठे तरी आम्ही चुकीचे वळण घेतले आणि काही किलोमीटर पुढे गेल्यानंतर ते आमच्या लक्षात आले. पण त्या जागी कुठलेही नेटवर्क चालत नव्हते. आम्ही नेमके कुठे आहोत हे सुद्धा समजत नव्हते.  मध्ये एका ठिकाणी लहानशी वस्ती दिसली म्हणून तिथल्या एका दुकानात जाऊन चौकशी केली तर समजले की त्या भागात कुठे ट्रान्स्मिशन टॉवर नव्हता आणि इंटरनेट चालत नव्हते. अमेरिकेत अशीही जागा असेल असे आम्हाला वाटले नव्हते.   त्या दुकानातल्या माणसाने सांगितले की आलेल्या रस्त्याने परत जावे आणि दहा बारा मैलावर एक हायवे लागेल, तिथे डाव्या बाजूला वळावे.  त्यानंतर आम्ही कुठे न हरवता पण तासभर उशीराने पिंकीच्या घरी जाऊन पोचलो. तिथे आमचा छान आदरसत्कार आणि खूप गप्पा झाल्या.

इसवी सन २०२५च्या आठवणी -६

न्यूयॉर्क शहराच्या मेट्रोपोलिटन भागात असलेल्या पण न्यूजर्सी राज्यातल्या लिंडहर्स्ट नावाच्या गावात स्थायिक झालेल्या श्री.भाऊसाहेब कुलकर्णी यांनी त्यांच्या बंगल्याच्या आवारातच एका प्रशस्त खोलीत, खरे तर गॅरेजमध्ये, विठ्ठल व रखुमाई यांच्या मूर्ती ठेऊन एक लहानसे देऊळ केले आहे. ते दरवर्षी पुढाकार घेऊन आषाढ एकादशीच्या ३-४ दिवस आधी एडिसन शहराजवळच्या एकाद्या पार्कमध्ये विठोबाच्या वारीचे मोठे रिंगण घडवून आणतात. या वर्षी मी इथे असल्यामुळे या रिंगणाला हजर राहिलो होतो. एकादशीच्या दिवशी त्यांनी त्यांच्या गावातच पालखीचे आयोजन केले होते. त्यात विठ्ठलरखुमाईच्या प्रतिमा आणि पादुका एका पालखीत ठेवून ती विठ्ठलनामाच्या गजरात लिंडहर्स्टच्या परिसरातच फूटपाथवरून एकदीड मैल फिरवून देवळात परत आणली. त्यानंतर तिथे धार्मिक नृत्यगायनाचा कार्यक्रम आणि आरती झाली. या कार्यक्रमालाही सुमारे दीडदोनशे भक्तजन आले होते.  श्रमपरिहारासाठी सर्वांना उपवासाचा फराळ देण्यात आला. मला भारतात असतांना  एकादशीच्या दिवशी तिथल्या कुठल्या विठ्ठलाच्या देवळात जायला सहसा जमत नाही, पण न्यूजर्सीमध्ये मात्र दोन वेळा तसा योग आला.

अमेरिकेत रहाणाऱ्या भारतीय लोकांनी ठिकठिकाणी हिंदू देवतांची मंदिरे बांधली आहेतच. श्री व्यंकटेश (बालाजी),  पंचमुखी हनुमान किंवा महालक्ष्मी यासारख्या मुख्य देवतांच्या मंदिरांमध्येच श्रीगणेश, श्रीराम, श्रीकृष्ण, महादेव, दुर्गामाता वगैरे इतर अनेक देवतांच्या सुंदर प्रतिमा ठेवलेल्या असतात. स्वामीनारायण संप्रदायाने जगभरातील अनेक देशांमध्ये बांधलेल्या अक्षरधाम यासारख्या भव्य आणि सुरेख अशा मंदिरांमध्येही अनेक हिंदू देवतांच्या सुबक मूर्ती ठेवलेल्या असतात.  शेगावचे संत श्रीगजाननमहाराज यांचा भक्तसंप्रदाय जगभर पसरला आहे. मुंबईपुण्यासारख्या शहरांमध्ये त्यांची मंदिरे आहेतच, पण अमेरिकेतल्या न्यूजर्सीतल्या न्यूब्रुन्सविक या गावी त्यांच्या भक्तगणांनी त्यांचे लहानसे मंदिर तयार केले आहे. तिथल्या एका दालनात श्रीगजानन महाराजांची मूर्ती ठेवली आहे आणि बाजूच्या दालनांमध्ये त्यांची भव्य चित्रे लावली आहेत. तिथे रोज पूजा आणि आरती होते, काही सण आणि प्रगटदिनाच्या दिवशी विशेष कार्यक्रम असतात.  तिथे श्रीगजाननविजय ग्रंथाच्या अनेक प्रती ठेवल्या आहेत आणि तिथे येणारे भक्त तिथल्या एका दालनात बसून त्याचे पठण करतात. मी तिथे असतांना एकदा सार्वजनिक सत्यनारायण पूजा ठेवली होती, त्याचे पूजाविधि आणि कथावाचन हिंदीमध्ये केले होते. या मंदिरासाठी शेगावहून चांदीच्या पादुका आणल्या होत्या. आधी त्या पादुकांना निरनिराळ्या भक्तांच्या घरी समारंभपूर्वक फिरवून आणले. त्या प्रत्येकाच्या घरी एका विशिष्ट क्रमाने त्यांची पूजा आरती आणि भजन करण्यात आले. त्यानंतर एका मुहूर्तावर त्यांची मंदिराच्या सभोवती मिरवणूक काढून त्याची श्रीगजाननमहाराजांच्या मूर्तीच्या शेजारी विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.  या काळात मी तिथे असल्यामुळे मला हे सोहळे पहायची संधी मिळाली.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आम्ही घरी गणेशोत्सव साजरा केला. आमच्या घरापासून जवळ असलेल्या एडिसन शहरात खूप मोठ्या संख्येने भारतीय लोक राहतात. तिथल्या पटेल स्टोअरमध्ये एकूण एक सगळ्या 'देशी' वस्तू मिळतात. तिथेच शाडू मातीची सुबक मूर्ती आणि पूजेचे सर्व सामान मिळाले.  गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवशी सत्यनारायणपूजाही करून घेतली आणि ओळखीतल्या सर्वांना संध्याकाळी दर्शनाला बोलावले. न्यूजर्सीमधल्या त्या गावातही  पंचवीस तीस लोक आले होते.  "गणपतिबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" च्या गजरात सगळ्यांनी गणरायाला निरोप दिला. परसात ठेवलेल्या एका टबातच मूर्तीचे विसर्जन केले. मी भारतात असतांनापेक्षा अमेरिकेतच थोडा जास्त धार्मिक झालो होतो.


इसवी सन २०२५च्या आठवणी -७

मी दोन वर्षांपूर्वी न्यूजर्सी स्टेटमधील त्या खेडेगावातल्या बंगल्यात चार महिने राहून आलो होतो. तिथे मला चोवीस तास निसर्गाच्या सहवासात रहायचा एक आगळा वेगळा अनुभव आला होता. आमच्या अंगणातल्या आणि परसातल्या अनेक झाडांना फुलांचा बहर आला होता. त्यामुळे सगळीकडे प्रसन्न वातावरण होते. आमच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला एक प्रशस्त पडवी होती. तिथे आणि बागेतही खुर्च्या ठेवल्या होत्या.  मी दिवसातला बराचसा वेळ तिथेच बसून रहात असे. पण यावर्षी तिथे पोचल्यापासून पावसाची पिरपिर चाललेली असल्यामुळे मला तिथल्या वृक्षवल्ली आणि वनचरांना भेटायची संधीच मिळत नव्हती. एकदा थोडी उघडीप पडली होती म्हणून आसमंतात एक फेरफटका मारून आलो तर इथे आणखी कोण नवीन आले आहेत हे पहायला आलेले एक गोंडस हरीणही दुडदुडतांना दिसले. ससे तर नेहमीच दिसायचे. मला तिथे एक काट्यावाचून गुलाब पहायला मिळाला. या फोटोत दिसणारे झाड गुलाबासारखे अजीबात दिसत नाही. लक्ष देऊन पाहिले तर त्यावर एक वेल चढलेली दिसते. तीसुद्धा गुलाबासारखी दिसत नाहीच. दोन्ही झाडांना एकही काटा नाही, पण तिला आलेले एक तळहाताएवढे मोठे फूल थेट गुलाबासारखे दिसते. एका बंगल्यासमोर सूर्यफुलांचा प्रसन्न असा लहानगा ताटवा फुलला होता. नंतरच्या काळातही कधी ऊन कधी पाऊस असा खेळ चालला होता. त्यामुळे रोज नियमितपणे प्रभातफेरी आणि सायंफेरी होत नव्हती. या वर्षी आम्हाला परसामध्ये भाजीपाला लावायला वेळ मिळाला नव्हता, त्यामुळे त्या रोपांची वाढ आणि रोज त्यांना आलेली नवी पाने, फुले आणि फळे वगैरे पहाण्याची मजा नव्हती. शिवाय या वर्षी त्या गावातच सगळीकडे अतोनात डास झाले असल्यामुळे उघड्यावर बसायची सोय नव्हती. या सगळ्या कारणांमुळे या वर्षी मला जास्त वेळ घरीच बसून रहावे लागत होते. 


जुलै महिन्यात एकदा दिवसभर ढगाळ वातावरण होते, पण प्रत्यक्ष पाऊस पडत नव्हता. रस्तेही कोरडे होते आणि ऊन नव्हते. म्हणून मी संध्याकाळच्या फेरीसाठी घराबाहेर पडलो. पंधरा वीस मिनिटात एक आवर्तन पूर्ण करून घराकडे परत येत होतो. आणखी एक बंगला ओलांडला आणि रस्ता क्रॉस केला की मी घरी पोचणार होतो. एवढे अंतर धावत धावत पाच दहा सेकंदात पार करता येईल. मला  काठी टेकत टेकत चालतांनासुद्धा एक मिनिट लागले असते इतक्या जवळ मी येऊन पोचलो होतो. पण एकाएकी भयानक जोरात सोसाट्याचा वारा सुटला आणि मुसळधार पाऊस पडायला लागला. वाऱ्याचा इतका भयानक जोर होता की मला  एका जागी उभे राहणेसुद्धा अवघड झाले होते, मग चालत पुढे जायचा प्रश्नच नव्हता. मी कसाबसा जवळच्या विजेच्या खांबापाशी गेलो आणि त्याला धरून त्याच्या आधाराने उभा राहिलो. अमेरिकेत विजेचे खांब  उंच झाडांच्या सरळसोट खोडांचे असतात आणि ते दणकट असतात.

मी तिथे उभा असतांना बाजूच्या बंगल्यातली मालकीण मोटारीतून तिच्या घरी परत येत होती. ती मला पाहून जवळ आली, तिने पटकन कारचा पलीकडला दरवाजा उघडला आणि मला कारमध्ये यायची खूण केली. मी ते चार पावलांचे अंतर कसेबसे कापले आणि कारमध्ये शिरलो. मी तिला सांगितले की मला फक्त समोरच्या घरापर्यंतच जायचे आहे. तिने म्हंटले काही हरकत नाही आणि मला घरापर्यंत आणून सोडले.  तोपर्यंत मी कुठे असेन याच्या काळजीने माझा मुलगा आणि सून दरवाजाच्या बाहेर पावसात आले होते आणि त्यांची गाडी सुरू करून मला शोधायला निघणार होते तेवढ्यात मी समोरून एका शेजारणीच्या गाडीत बसून येत होतो. त्यांनी लगेच मला हाताला धरून घरात आणले. इतक्यात एक मोठा आवाज आला आणि आमच्या शेजारच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला एक पन्नास साठ फूट उंच झाड काडकन मोडून खाली पडलेले दिसले. नशीब चांगले की ते पूर्णपणे मोकळ्या जागेत पडले, त्यामुळे दुसरी कसली हानी झाली नाही.

त्यानंतर एका संध्याकाळी पुन्हा जास्तच जोराचा झंझावात आला. यावेळी आम्ही घरीच होतो. तिथल्या हवामान खात्याने सगळ्या लोकांच्या मोबाइलवर चक्री वादळाच्या धोक्याचा कडक इशारा पाठवला. त्यात असे स्पष्ट लिहिले होते की ही जिवाला धोका असणारी धोकादायक परिस्थिती आहे. जर तुम्ही पूरग्रस्त भागातून पळून जात नसाल किंवा तुम्हाला जागा सोडून जायचा सरकारी आदेश दिलेला नसेल तर तुम्ही घराबाहेर पडून कुठेही जाण्याचा प्रयत्नसुद्धा करू नये. घराची सगळी दारे आणि खिडक्या बंद कराव्यात आणि तळमजल्यावर किंवा तळघरात जाऊन थांबावे. आम्ही तसेच केले, सगळेजण तळमजल्यावरील एका खोलीत जीव मुठीत धरून बसून राहिलो.  या झंझावातामध्ये आमच्या भागातल्या काही रस्त्यांवर बरेच पाणी साठले होते आणि काही घरांच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरून तिथे ठेवलेल्या सामानाचे नुकसान झाले होते.

. . . . . 

अशाच एका झंझावाताचा व्हीडिओ कुणीतरी आमच्या पुणेरी डीएई ग्रुपवर टाकला होता. तो पाहून मला ते वादळ तंतोतंत जसे मी प्रत्यक्ष पाहिले होते तसेच वाटले. तो  व्हीडिओ पाठवणाऱ्या आरएम भोर यांना मी वॉट्सॅपवर मेसेज पाठवून तुम्ही कुठे राहता असे विचारल्यावर त्यांनी साउथ प्लेन फील्ड असे सांगितले. मी पण त्याच गावात होतो.  आम्ही पुण्यातल्या एकाच ग्रुपमध्ये असलो तरी प्रत्यक्षात कधी भेटलो नव्हतो. आता साता समुद्रापार एकाच वेळी त्या लहानशा अनोळखी गावात आलो होतो हा एक विलक्षण योगायोग होता. मग आम्ही टेलिफोनवर बोलणे करून एकमेकांचे पत्ते विचारून घेतले. आमच्या घरांमध्ये साडेचार मैल इतके अंतर असल्यामुळे सहज चालत चालत जाऊन भेटता येण्यासारखे नव्हते. पण एकदा आम्ही आमच्या घरी भेटलो आणि खूप गप्पा मारल्या.  मला एक विलक्षण धडपड्या आणि कर्तृत्ववान मित्र मिळाला. त्याने हेल्पर या पायरीवरून सुरुवात करून नोकरी करता करता उच्च शिक्षण घेतले होते आणि बढत्या घेत फोरमन या पदापर्यंत मजल मारली होती. आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन इंजिनियर केले होते आणि या वेळी तो आपल्या इंजिनियर मुलीच्या घरी अमेरिकेला आला होता.

इसवी सन २०२५च्या आठवणी -८

या वर्षाच्या सुरुवातीपासूनच मला अगदी हळू हळू अंगात थोडा अशक्तपणा वाटायला लागला होता आणि मी त्याबद्दल दोन तीन डॉक्टरांना विचारून काही उपचार सुरू केले होते. वयोमानाने असे होत असेल असेच मला आणि इतरांनाही वाटत होते. माझ्या डॉक्टर मित्राने तर थट्टा मस्करी करतांना आता दोन चार महिने अमेरिकेला जाऊन चांगले धष्टपुष्ट होऊन या असे सांगितले होते. मी अमेरिकेला गेलो तेंव्हा तिथे सतत पावसाची पिरपिर सुरू होती आणि थंडगार वारे वहात होते. कदाचित मला ते हवामान सोसले नाही आणि सर्दीखोकला सुरू झाला तो १०-१५ दिवस चालला. त्यामुळे अंगात पुन्हा थोडा अशक्तपणा आला. चांगले खाऊन पिऊन आणि व्यायाम करून माझी तब्येत सुधारण्याच्या मार्गावर लागली होती. पण दीड दोन महिने गेल्यावर अचानक बरे वाटेनासे झाले. मला काय होते ते सांगता येत नव्हते पण मधूनच डिस्कम्फर्ट वाटायचा आणि विश्रांती घेतल्यावर तो आपोआप हळू हळू कमी व्हायचा. त्यानंतर पुन्हा हातापायातली शक्ती कमी व्हायची असे दोन तीन वेळा झाल्यानंतर मी तिथल्या पटेल नावाच्या अनुभवी डॉक्टरकडे गेलो. त्याने मला तपासले आणि ईसीजी काढला. त्यात त्याला काहीतरी शंका आली म्हणून त्याने कार्डिऑलॉजिस्टकडे जाऊन शंका निरसन करून घ्यायला सांगितले. तोपर्यंत मला तिथे जाऊन साडेतीन महिने झाले होते. माझा तिथे पाच महिने रहायचा कार्यक्रम होता, तो आवरता घेऊन मी आधीच भारतात यायचे ठरवले आणि तिकिट प्रिपोन करून घेतले.

इथे आल्यावर हॉस्पिटलमध्ये कार्डिऑलॉजिस्ट आणि न्यूरॉलॉजिस्ट यांच्या अॅपॉइंटमेंट्स घेतल्या. दोघांनीही दोन दोन वेगवेगळ्या चाचण्या करून घेतल्या.  हृदयरोगतज्ञांनी दिलासा देत सांगितले की ईसीजीमधला शंकास्पद दोष विशेष गंभीर नाही. त्यांनी माझी औषधे थोडी बदलून दिली. मज्जासंस्थेच्या डॉक्टरांनी कुठले औषध दिले नाही, फक्त पायामध्ये स्टॉकिंग्ज घाला आणि  हातात काठी असू द्या अशा सूचना दिल्या. पण दरम्यान माझे रोजचे व्यायाम आणि फिरायला जाणे बंद झाले होते. डॉक्टरांना विचारून ते सुरू करून हळू हळू वाढवले. अशा प्रकारे दोन तीन महिने या घालमेलीत गेले.

या काळात माझा वाढदिवस आणि दिवाळी येऊन गेली ती आम्ही नेहमीसारखी उत्साहातच साजरी केली. आमच्या जमखंडी या गावातून बाहेर पडलेल्या लोकांचे दरवर्षी पुण्यात एक स्नेहसंमेलन भरते. मी त्याला उपस्थित राहिलो आणि तिथे आलेल्या जुन्या मित्रांना आणि आप्तांना भेटलो.


आमच्या कॉलनीतल्या ज्येष्ठ नागरिकांची कासारसाई धरणाशेजारी असलेल्या स्नेह रिसॉर्टमध्ये हुरडा पार्टी होती. दोन लहान बसेसमधून आम्ही साठ लोक तिथे जाऊन पोचलो. तिथली व्यवस्था वाखाणण्यासारखी होती. नाश्ता, जेवण आणि चहापानाची व्यवस्था उत्तम होती. सगळे खाद्यपदार्थ चविष्ट आणि भरपूर होते. मनोरंजनासाठी राजस्थानी नाच, कठपुतली नाच, जादूचे प्रयोग वगैरे होते. नौकानयन आणि रेनडान्सही होतेच. एक लहानसे चिडियाघर होते.  निरनिराळ्या मिनिथिएटर्समध्ये एका ठिकाणी हॉरर शो, दुसरीकडे मिसाइल्सवर फिल्म तर तिसऱ्या सभागृहात ऑपरेशन सिंदूरवर डॉक्युमेंटरी दाखवली. तिथे मिळालेल्या हुरड्याबरोबर भाजलेला सोलाणा (हिरवा हरभरा) आणि वाफवलेली मक्याची कणसे (स्वीट कॉर्न) आणि गोड जाड शेव होती.  लहान लहान गटांमध्ये इकडे तिकडे फिरण्यात आणि तिथले निरनिराळे खेळ पहाण्यात आमचा वेळ छान गेला. सर्वांनी आळीपाळीने मिनिट्रेनमध्ये बसून  रिसॉर्टला फेरी मारून घेतली. आम्ही अंताक्षरी खेळण्यासाठी सगळी यंत्रसामुग्री नेली होती, पण त्यासाठी मोकळा वेळच मिळाला नाही. बसमधून जातायेतांनाच थोडी गाण्याची हौस भागवून घेतली. 


इसवी सन २०२५च्या आठवणी -९

गेल्या वर्षभरात माझ्या व्यक्तिगत आयुष्यात होऊन गेलेल्या काही लक्षात राहिलेल्या बारीक सारिक घटना मी आधील भागात सांगितल्या. या वर्षभरात मी रोज काय करत होतो? सकाळी थोडा प्राणायाम, व्यायाम आणि फिरणे, संध्याकाळी फिरणे आणि कट्ट्यावर बसून गप्पा मारणे, रोज एक नवे सुभाषित मराठी भाषांतरासह फेसबुकवर देणे,  अधून मधून काही स्फुट लेखन करणे, ते फेसबुकवर किंवा ब्लॉगवर चढवणे, महिन्यात एक लेख तयार करून तो विज्ञानधारा मासिकाला पाठवणे, फेसबुक, ईमेल आणि निरनिराळ्या वॉट्सॅप ग्रुपवर फेरफटका मारून येणे, दिवसातून तीन वेळा खाणे पिणे आणि औषधे घेणे वगैरे. मी हेच काम मागील चारपाच वर्षे करत आलो आहे. या वर्षी वेगळे काय केले?

मी जन्मभर एकट्याने चिकार प्रवास केला आहे, पण आता मला बस किंवा ट्रेनमध्ये चढताउतरतांना आधार लागतो यामुळे मी हल्ली एकट्याने कुठेही जाणे येणे सोडून दिले आहे.  गरज पडते तेंव्हा माझा मुलगा मला कार किंवा स्कूटरवरून घेऊन जातो. हिंजवडीला आल्यापासून मी या वर्षी पहिल्यांदाच आमच्या ज्येष्ठ नागरिकसंघातल्या मित्रांबरोबर दोनदा दिवसभराच्या सहलीला जाऊन आलो. ओला उबरच्या कॅब आणि मोबाइल फोनवरील त्यांच्या अॅप्स येऊन काही वर्षे झाली असतील, पण मी त्यांचे तंत्र मागच्या वर्षी पहिल्यांदा शिकून घेतले. या वर्षी मी तीन चार वेळा स्वतः सराइतपणे कॅब बुक केली, एकट्याने प्रवास केला आणि त्याचे यूपीआयने पेमेंट केले. या अगदी सरळ साध्या वाटणाऱ्या गोष्टी असल्या तरी माझ्या वयाच्या अनेक लोकांना अजून जमत नाहीत. त्या मी या वर्षी केल्या. मला रोजच्या जीवनात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी न मागताच मिळत असतात. ज्या गोष्टी माझ्याकडे नसतील त्यांची मला गरजच नाही असे मी म्हणत असतो. यामुळे मी फारसा बाजारात जातच नाही.  पण आता ऑल लाइन मार्केटिंगमुळे घरबसल्या खरेदी करता येते. याचे तंत्रही मला इतके दिवस माहीत नव्हते. ते मी यावर्षी कुणालाही न विचारता ट्रायल अॅड एरर करून शिकून घेतले आणि मला गरज नसतांनाही अॅमेझॉनवरून हौस म्हणून नवे कपडे मागवून घेतले. मला भेंड्या खेळायची आवड असल्यामुळे शेकडो हिंदी आणि मराठी गाण्यांच्या सुरुवातीच्या दोन दोन ओळी चालीसकट पाठ होत्या, पण मी पूर्ण गाणे गायचा प्रयत्न करत नव्हतो कारण मला मधली कडवी माहीतच नसायची. इथल्या ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर बसल्या बसल्या गप्पागोष्टींच्या शिवाय गाणी म्हणायचीही टूम निघाली.  आमच्यातला कुणीच खरा गायक नसल्यामुळे बहुतेक सगळे एकाच पातळीवर आहेत आणि कुणी कुणाला नावे ठेवत नाही कुणी कुणाच्या चुका काढत नाही. आता गूगल करून संपूर्ण गाण्याचे शब्द मिळायची आणि यू ट्यूबवर त्या गाण्याची रेकॉर्ड ऐकायचीही सोय आहे. तिचा उपयोग करून मीही गाणी गायला लागलो होतोच. या वर्षी आम्ही आणखी एक पाऊल पुढे टाकून एक कराओके ग्रुप केला आणि दर ८-१० दिवसांनी एकत्र जमून व्यवस्थित माइक आणि स्पीकरवर किंचित जास्त चांगल्या प्रकारे गाणी म्हणायला सुरुवात केली. या वर्षातली आणखी एक उपलब्धी म्हणजे मी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून घेणे शिकून घेतले आणि माझ्या लेखनासाठी तिचा उपयोग करायला सुरुवात केली.    


इसवी सन २०२५च्या आठवणी -१०

 मी खूप दिवसांपासून कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल ऐकत होतो. "तू त्याचा उपयोग का करत नाहीस?" असे एकदा माझ्या मित्राने विचारलेही होते. त्यामुळे मलाही काही तरी चुकल्यासारखे वाटायला लागले होते. पण त्यासाठी एक नवे अॅप डाउनलोड करून त्याचा वापर करणे शिकायचे हेच मला थोडे अवघड वाटत असल्यामुळे मी इतके दिवस आळस करत होतो. पण या वर्षाअखेर मी  ठरवले की आपण हे करून पहायचेच आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते फारच सोपे काम होते. मी त्या एआयला एक गोष्ट लिहायला सांगितली आणि त्याने ती काही सेकंदांमध्ये लिहून दिली. त्यानंतर त्यासाठी चित्र हवे का? असे विचारले आणि लगेच ते काढूनही दिले. त्यानंतर मी माझ्या लेखनासाठी एआयचा उपयोग करायला सुरुवात केली.  

 आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाने या वर्षी असे ठरवले की वयाची पंच्याहत्तर वर्षे उलटून अमृतकालात गेलेल्या लोकांना एक सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा. मी ही पायरी पूर्वीच ओलांडली असल्यामुळे मलाही ते मिळालेच. त्यानंतर काही लोकांना ते माझ्या हस्ते देण्यात आले. 

गेल्या ४०-५० वर्षांपासून मी जिथे जिथे रहात होतो तिथल्या जवळच्या बँकेत माझा एक सेफ डिपॉझिट व्हॉल्ट लॉकर असायचा. त्यात जपून ठेवण्यासाठी माझ्याकडे कधीच मोठा खजिना नव्हता, पण आपले किडूकमिडूक घरी ठेवण्यापेक्षा तिथे सुरक्षित ठेवायची आम्हाला सवय झाली होती. मी धायरीला रहात असेपर्यंत ते चालत आले होते, पण हिंजवडीला आल्यावर इथल्या बँकेत खाते उघडले तेंव्हा मला लॉकर मिळाला नव्हता. सात आठ वर्षांनंतर एका बँकेत तो एकदाचा मिळाला. यापूर्वी फक्त एक फॉर्म भरून दिला की लॉकर घ्यायचे काम अर्धापाऊण तासात होत होते. पण आता सगळे काम डिजिटल झाले आहे आणि त्यासाठी स्टँपपेपरवर करारपत्र करावे लागते तसेच एक घसघशित रकमेचे फिक्स्ड डिपॉझिट करावे लागले. त्यांच्या डिजिटल प्रोसेसमध्ये चार वेळा कसकसले ओटीपी आले, ते घेण्यासाठी तुमच्याकडे स्मार्ट फोन असायला हला, त्याचप्रमाणे ई मेल आयडीसुद्धा असायला हवा. माझ्याकडे दोन्हीही होते, नसते तर हे काम झालेच नसते. या वेळी मला त्या कामासाठी सलग तीन दिवस लागले.  

अशा प्रकारे मी या वर्षी थोडी प्रगती केली आणि किंचित जास्त आत्मनिर्भर झालो.

(समाप्त)