Thursday, December 26, 2024

विज्ञानामधले द्वैत अद्वैत

मी फेसबुकवर लिहिलेल्या लेखमालिकेतले सगळे भाग एकत्र करून या पानावर दिले आहेत. त्यातले काही परिच्छेद सुटे सुटे वाटण्याची शक्यता आहे.


जगद्गुरु शं‍कराचार्यांनी अद्वैतवादाचा पुरस्कार करून हिंदू किंवा सनातन धर्माचे पुनरुज्जीवन केले असे सांगितले जाते. हे अद्वैताचे तत्वज्ञान वेदांमधून चालत आले आहे. शंकराचार्यांनी त्याला पुन्हा उजाळा दिला असेही म्हणतात. पण शं‍कराचार्यांच्यानंतर आलेल्या मध्वाचार्यांनी पुन्हा द्वैतवादाचा पुरस्कार केला आणि त्यांचे मतही स्वीकारले गेले. द्वैत आणि अद्वैत ही दोन्ही मते गेली कित्येक शतके तग धरून आहेत, पण ती फक्त उच्च दर्जाच्या शास्त्री विद्वानांनाच पूर्णपणे समजलेली असावीत किंवा ते लोकच कदाचित त्यावर तात्विक वाद घालत असतील. सर्वसामान्य माणसाचे आयुष्य त्याशिवायच व्यवस्थित चाललेले असते.

द्वैत अद्वैत हे काय आहे याचे मलाही कुतुहल वाटत होते म्हणून मी ते समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न करून पाहिला. कुणी सांगितले की आत्मा आणि परमात्मा हे दोन भिन्न आहेत असे म्हणणे हे द्वैत आणि ते दोन्ही वेगळे नसून एकच आहेत  असे सांगणे म्हणजे अद्वैत.  आणखी कुणी सांगितले की ब्रह्म आणि माया यांना वेगवेगळे समजणे हे द्वैत आणि या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असणे हे अद्वैत. या सगळ्याच गोष्टी माझ्या आकलनाच्या पलीकडे असल्यामुळे मी जास्त खोलात जायचा प्रयत्न केला नाही.



मला अध्यात्मातले फारसे काही कळत नाही. मी जन्मभर विज्ञान आणि तंत्रज्ञान यातच घालवला असल्यामुळे त्यातले एक सोपे उदाहरण सुचले. बर्फ आणि पाणी किंवा पाणी आणि वाफ यांना आपण वेगवेगळे समजतो कारण ते वेगवेगळे दिसतात किंबहुना भौतिकशास्त्राप्रमाणे ते तसे असतात. त्यांचे भौतिक गुणधर्म वेगवेगळे असतात. हे झाले द्वैत. पण रसायनशास्त्र सांगते की हे सगळे H2O आहेत, त्यांचे अणु एकच आहेत. हे त्यांचे अद्वैत झाले. हे जरा जास्तच सोपे उदाहरण झाले. विज्ञानातल्या एका मुख्य द्वैत अद्वैतावर गेली तीन शतके वादविवाद चालला आहे.

रोज सकाळी सूर्य उगवतो, सगळीकडे उजेड पडतो आणि आपल्याला आजूबाजूच्या गोष्टी दिसायला लागतात. म्हणजे नेमके काय होते? शास्त्रज्ञांनी त्याचा विचार करून असे सांगितले की सूर्यापासून निघालेल्या प्रकाशाचे असंख्य किरण आपल्या पृथ्वीपर्यंत येऊन सगळीकडे पसरतात आणि आपल्या आजूबाजूला असलेले डोंगर, झाडे, घरे, माणसे, पशुपक्षी वगैरेंवर पडत असतात. त्यातले काही किरण शोषले जोऊन नष्ट होतात तर काही किरण त्या पदार्थांना धडकून तिथून पुन्हा चहू बाजूंना पसरत असतात. त्यातले जे किरण त्यांच्यावरून परावर्तित होऊन आपल्या डोळ्यांपर्यंत येतात त्या किरणांमुळे आपल्याला त्या गोष्टी दिसतात. एखादा माणूस किंवा प्राणी कुठून तरी निघून दुसऱ्या ठिकाणी जातो हे सहज समजण्यासारखे असते. तशाच प्रकारे प्रकाशाचे किरण हे अतिसूक्ष्म कण असतात आणि ते इकडून तिकडे जात असतात असे प्रतिपादन प्रख्यात इंग्लिश शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन याने केले. पण हे किरण जिथे जाऊन पडतात तिथे ते साठून का रहात नाहीत? ते क्षणार्धात आपोआप नष्ट कसे होतात? अशा शंका येत होत्या.

त्याच्याच काळातल्या डच फिजिसिस्ट ख्रिश्चन हुजेन्स याने असे सांगितले की  प्रकाश हा तरंगांच्या स्वरूपात इकडून तिकडे जातो. पाण्यावर लहरी उठतात तेंव्हा पाण्याच्या पृष्ठभागावरले कण खरे तर जागच्या जागीच वर खाली होत असतात. पण ते अशा ठराविक क्रमाने होतात की पहाणाऱ्याला असे वाटते की ते तरंग एका दिशेने पुढे पुढे जात आहेत. पण  तरंगांना पुढे जाण्यासाठी एकाद्या माध्यमाची गरज असते. सूर्य, चंद्र, तारे आणि पृथ्वी यांच्यामध्ये तर निर्वात पोकळी असते, मग हे प्रकाशकिरण त्यातून इकडे कसे येत असतील? अशा शंका होत्या. त्यावेळी न्यूटनला फार जास्त मान होता, त्यामुळे त्याचे मत अधिक ग्राह्य मानले गेले. 

तरीही प्रकाशाचे किरण हे कण आहेत की तरंग यावर शास्त्रज्ञांचे दोन गट झाले होतेच. दोन्ही गटांमधले शास्त्रज्ञ आपापल्या परीने या शंकांचे निरसन करायचे प्रयत्न करत होते, तसेच प्रयोगांमधून प्रकाशकिरणांचे जे निरनिराळे गुणधर्म किंवा नियम सापडत होते त्यांचे स्पष्टीकरण देत होते. इंटरफरन्स या गुणधर्माचा अभ्यास करण्यासाठी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस डबल स्लिट एक्सपेरीमेंट आणि पोइसोन स्पॉट एक्सपेरिमेंट हे दोन महत्वाचे प्रयोग केले गेले. त्यांच्या निरीक्षणावरून निघालेले निष्कर्ष मात्र तरंगांच्या बाजूचे होते. ती निरीक्षणे तरंगांवरूनच सिद्ध करता येत होती असे त्यांना वाटले. यामुळे पुढील शंभर वर्षे न्यूटनचा  कण सिद्धांत मागे पडला आणि तरंग सिद्धांतालाच विज्ञानात मान्यता मिळत राहिली.  

पुढे एकोणीसाव्या शतकात प्रकाशलहरींवर तसेच विद्युतचुंबकीय गुणधर्मांवर कसून संशोधन चालले होते. प्रकाशलहरींची वेव्हलेंग्थ आणि फ्रिक्वेन्सी यांची मोजमापे घेतली गेली. सूर्यप्रकाशातल्या सात रंगांमध्ये ते कसे बदलत जातात हे समजले. प्रकाशकिरण म्हणजे विद्युतचुंबकीय लहरी असतात आणि जगात अनेक प्रकारचे अदृष्य किरणही असतात वगैरे सिद्ध करण्यात आले. त्यांचा अभ्यास करण्यासाठी स्पेक्ट्रोस्कोपी नावाची एक वेगळी शाखा उदयाला आली आणि त्यात निरनिराळी उपकरणे तयार करण्यात आली. विद्युतचुंबकीय क्षेत्र, विजेचा प्रवाह वगैरेंवर संशोधन होतच होते. यावर संशोधन करत असतांना इ.सन १८९७मध्ये जे.जे.थॉमसन या संशोधकाने इलेक्ट्रॉन या कणाचा शोध लावला. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन हे घटक मिळून अणू तयार होतात असे रूदरफोर्ड या शास्त्रज्ञाने सांगितले.

समजा एका तरणतलावात अनेक लोक पोहत आहेत. एक माणसाने स्प्रिंगबोर्डवरून पाण्यात सूर मारला तर काय होईल? पाण्यात थोडी खळबळ होऊन काही लाटा उठतील आणि पाण्यातल्या इतर लोकांना त्यांचा किंचितसा धक्का बसेल. पण कुणी असे सांगितले की त्याची सगळी ऊर्जा घेऊन पाण्यातला एक माणूस त्याच्या जागेवरून उडेल आणि किनाऱ्यावर येऊन पडेल, तर त्यावर कुणाचा विश्वास बसेल का? आपल्याला हे अशक्य, अतर्क्य आणि असंभवनीय वाटणार. पण विशिष्ट परिस्थितीत असा प्रकार घडणे शक्य आहे आणि निसर्गात असे घडत असते असे सन १९०५मध्ये जेंव्हा आल्बर्ट आइन्स्टाइनने सांगितले तेंव्हाच्या शास्त्रज्ञांनाही ते लगेच पटले नव्हतेच.

 प्रकाशकिरणांवर संशोधन करत असतांना काही शास्त्रज्ञांना असे दिसले की विशिष्ट प्रकाशकिरणांमुळे काही पदार्थांच्या विद्युतचुंबकीय गुणधर्मांमध्ये काही बदल होतात. त्यावर आल्बर्ट आइन्स्टाइनने असा सिद्धांत मांडला की प्रकाशकिरण हे सूक्ष्म कण असतात आणि विशिष्ट ऊर्जा असलेले हे कण इलेक्ट्रॉन या कणांना अणूंमधून बाहेर ढकलतात. त्या पदार्थावर तसे प्रकाशकिरण पडले तर त्यातून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. याला फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट असे नाव दिले गेले. हे निर्विवाद सिद्ध झाल्यानंतर १९२१ सालचा नोबेल पुरस्कार आइन्स्टाइनला दिला गेला. प्रकाश किरण या लहरी आहेत असे समजले तर या इफेक्टचे स्पष्टीकरण देता येत नाही. त्यासाठी ते सूक्ष्म असे कणच असायला हवेत. पुढे प्रकाशाच्या या कणांना फोटॉन असे नाव दिले गेले.  न्यूटनचा झिडकारला गेलेला कणांचा सिद्धांत पुन्हा समोर आला.  

कुठल्याही सूक्ष्मदर्शक यंत्राने कधीही अणू पाहता येत नाहीत, इतके ते सूक्ष्म असतात. फोटॉन आणि इलेक्ट्रॉन तर अणूपेक्षाही सूक्ष्म असतात. मग एक फोटॉन येऊन अणूमधल्या एका इलेक्ट्रॉनला जोरात धक्का मारतो आणि त्याला अणूच्या बाहेर पाठवून देतो हे आइन्स्टाइनला कसे समजले? त्याने प्रयोग करतांना हे होतांना प्रत्यक्ष पाहिले आणि इतर शास्त्रज्ञांना दाखवले असे होण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्याने हे सगळे गणिते मांडून आणि तर्कशुद्ध विचाराच्या जोरावर आपल्या बुद्धीनेच ठरवले आणि सिद्ध करून दाखवले. आधीच्या काही शास्त्रज्ञांनी प्रयोग करतांना असे पाहिले होते की विशिष्ट धातूंच्या तुकड्यावर अल्ट्राव्हायोलेट किरणांचा झोत टाकला तर त्यांवर धन विद्युतप्रभार (पॉझिटिव्ह चार्ज) तयार होतो. अणूच्या रचनेवर संशोधन करतांना शास्त्रज्ञांनी असे ठरवले होते की प्रत्येक अणूच्या केंद्रामध्ये धन प्रभार असलेले प्रोटॉन्स असतात आणि ऋण प्रभार असलेले इलेक्ट्रॉन्स त्या केंद्राभोवती प्रदक्षिणा घालत असतात. दोन्ही मिळून त्या अणूचा विद्युतप्रभार शून्य होतो. पण काही कारणाने इलेक्ट्रॉन त्याला सोडून गेले आणि प्रोटॉन जागेवर राहिले तर त्या अणूला धन विद्युतप्रभार प्राप्त होतो. प्रकाश किरणांच्या झोतामुळे हे होत असेल तर त्यातले फोटॉन्सच इलेक्ट्रॉन्सना हुसकून लावण्यासाठी जबाबदार असणार असे आइनस्टाइनने नुसते सांगितलेच नाही तर त्याची गणिते मांडून कमीत कमी किती ऊर्जा असलेले प्रोटॉन्स हे काम करतील, त्यांची किती ऊर्जा इलेक्ट्रॉनसला दिली जाईल वगैरेंची सूत्रे तयार केली. आपल्याला फोटॉन आणि इलेक्ट्रॉन तर मोजता येतच नाहीत. कोणत्या प्रकारचे किती तीव्रता असलेले प्रकाशकिरण किती विद्युतप्रभार तयार करतील वगैरें साठी त्याने नियम सांगितले. त्या सगळ्याचा समावेश त्याच्या फोटोइलेक्ट्रिक इफेक्टवरील शोधात होतो.  त्यानंतर या फोटोइलेक्ट्रिक इफेक्टचा निरनिराळ्या प्रकारे उपयोग करून घेण्यासाठी अनेक उपकरणे तयार होत गेली आणि प्रकाशकिरण कणांनी बनले आहेत या कल्पनेवर शिक्कामोर्तब झाले.

त्यानंतर आर्थर होली काँप्टन या शास्त्रज्ञाने प्रयोगामधून असे दाखवून दिले की क्ष किरण इलेक्ट्रॉनवर आदळले तर ते नष्ट होत नाहीत पण आपली फ्रिक्वेंसी कमी करून इतरस्त्र पसरतात. याला काँप्टन इफेक्ट म्हणतात. यामधूनसुद्धा  प्रकाशकिरण सूक्ष्म कणांच्या स्वरूपात असतात असेच दिसते.


पण जर प्रकाशकिरण हे कण असतील तर ते लहरी आहेत असे समजून केलेल्या संशोधनांमधून झालेल्या प्रगतीचे काय होईल? प्रकाश किरणांच्या तरंगांच्या वेव्हलेंग्थ्स आणि फ्रिक्वेन्सी यावर संशोधन करून एक मोठा स्पेक्ट्रम तयार केला गेला होता. त्यात नॅनोमीटरपेक्षाही अतिसूक्ष्म वेव्हलेंग्थ असलेल्या गॅमा रेजपासून क्ष किरण, अल्ट्राव्हायोलेट, दृष्य प्रकाश, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह्ज, आणि कित्येक मीटर वेव्हलेंग्थ असलेल्या रेडिओवेव्ह्ज इतकी मोठी रेंज असते. निसर्गातल्या अशा निरनिराळ्या प्रकारच्या किरणांना ओळखून त्यांची मोजमापे घेण्याची उपकरणे तयार केली होतीच, असे किरण कृत्रिम रीत्या तयार करण्याची साधनेही तयार केली जात होती आणि विविध प्रकारे त्यांचे उपयोग केले जात होते. हैड्रोजन, हेलियम यासारख्या मूलतत्वांमधून ठराविक रंगाचे प्रकाशकिरण निघतात याचा उपयोग करून त्या मूलतत्वांचे अस्तित्व ओळखले जात होते. अशा सगळ्या कारणांमुळे प्रकाश किरण हे तरंगांच्या स्वरूपात असतात यातही कसलीही शंका नव्हती.

मॅक्स प्लँक या शास्त्रज्ञाने सांगितले की न्यूटनचे सिद्धांत सृष्टीचे सगळे नियम समजून घेण्यासाठी पुरेसे नाहीत.  त्यांने एक नवा विचार क्वांटम थिअरीमधून मांडला आणि त्याने भौतिकशास्त्राच्या  पुढील काळातल्या प्रगतीला वेगळी दिशा मिळाली. या सिद्धांतामधून असे सिद्ध करता येत होते की फोटॉनसारखे अतिसूक्ष्म कण एकाच वेळी लहरीसुद्धा असू शकतात. त्यांच्या दुहेरी अस्तित्वाला मान्यता मिळाली.

आपण आतापर्यंत प्रकाशकिरणांच्या संबंघातले कण आणि तरंग यांच्यामधले द्वैत अद्वैत पाहिले. मॅक्स प्लँकचा सिद्धात खरे तर ऊर्जेच्या गुणधर्माबाबत आहे. त्याने असे सांगितले की विद्युतचुंबकीय ऊर्जा पुंजक्यामधूनच प्रकट होते. Electromagnetic energy could be emitted only in quantized form, in other words, the energy could only be a multiple of an elementary unit. ऊर्जेचे एक सर्वात लहान प्राथमिक एकक असते आणि त्याच्या पटीमध्येच ऊर्जा प्रगट होते. ज्याप्रमाणे विश्वामधल्या सर्व पदार्थांचे अविभाज्य असे अणू नावाचे सूक्ष्म कण असतात त्याचप्रमाणे ऊर्जेचेसुद्धा सूक्ष्म क्वांटा असतात.  भले त्या लहरी असतील, पण त्याही सूक्ष्म अशा तुकड्यांमधून प्रकट होत असतात.  अर्थातच ज्याप्रमाणे आपल्याला अणू वेगळे काढून मोजता येत नाहीत त्याचप्रमाणे हे क्वांटाही मोजता येत नाहीत.  हे सगळे कल्पना आणि तर्कशुद्ध विचार यामधून निघालेले सिद्धांत आहेत आणि ते इतर सगळ्या शास्त्रज्ञांनी सखोल साधकबाधक चर्चा केल्यानंतर सर्वसंमतीने मान्य केले गेले आहेत.

आल्बर्ट आइन्स्टाइन हा शास्त्रज्ञ मुख्यतः त्याच्या सापेक्षता सिद्धांतासाठी प्रसिद्ध आहे.  सापेक्षतावादाचा सिद्धांत म्हणजे, जागा आणि वेळ यांच्या संकल्पना निरपेक्ष नाहीत तर सापेक्ष आहेत. या सिद्धान्तांनुसार विद्युत-चुंबकीय लहरींचा वेग सापेक्ष परिस्थितीमध्ये नेहमी स्थिर असतो आणि निरीक्षकाच्या वेगावर आणि स्थळावर अवलंबून नसतो. त्याने आणखी किचकट गणिते मांडून असे सिद्ध करून दाखवले की उर्जेचे पदार्थात रूपांतर होऊ शकते आणि पदार्थाचे ऊर्जेत रूपांतर होऊ शकते.  त्यासाठी त्याने मांडलेले E=mc^2 हे सूत्र सुप्रसिद्ध आहे. किंबहुना त्याच्या सांगण्यांनुसार पदार्थ आणि ऊर्जा ही एकाच मूलतत्वाची दोन रूपे असतात. असे हे आणखी एक द्वैत अद्वैत.

फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट आणि  काँप्टन इफेक्ट  या दोन्हींमध्ये फोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांची टक्कर होते आणि त्या कणांमध्ये किती ऊर्जा असते त्याप्रमाणे त्यामधून वेगवेगळे परिणाम होतात. हे दोन्ही प्रकारचे कण कुणीही पाहू शकत नाही आणि त्यामुळे त्यांची होत असलेली टक्करही कुणीच पाहिलेली नाही. प्रयोगशाळांमध्ये निरनिराळ्या तीव्रतेच्या किरणांचे झोत विशिष्ट धातूंच्या तुकड्यांवर टाकून त्यामधून निघालेल्या लहरींचे अतिशय संवेदनशील (सेन्सिटिव्ह) अशा उपकरणांनी केलेल्या निरीक्षणांचे स्पष्टीकरण या सिद्धांतांनी देता येते.

आतापर्यंत लहरीच्या स्वरूपात समजले जाणारे प्रकाशकिरण जर फोटॉन या कणांच्या रूपात असतील तर पदार्थांचे कण समजले जाणारे इलेक्ट्रॉन्स लहरीच्या स्वरूपात असू शकतील अशी शक्यता फ्रेंच शास्त्रज्ञ लुई  डी ब्रॉग्ली (Louis De Broglie) याने व्यक्त केली. त्यानंतर अणूचे भाग समजले जाणारे सगळेच सूक्ष्म कण हे लहरीच्या स्वरूपात असतात असे समजून त्यांचा अभ्यास केला जाऊ लागला. क्वांटम मेकॅनिक्स या नावाच्या विज्ञानाच्या शाखेत हा अभ्यास केला जातो. श्रोडिंजर या शास्त्रज्ञाने कणांच्या तरंग स्वरूपाचा अभ्यास करण्यासाठी काही गणिती समीकरणे मांडली. 

म्हणजे जर प्रत्येक अणू हाच काही तरंगामधून तयार होत असेल तर सगळे विश्वच तरंगांचा समूह आहे असे म्हणता येईल का? असा प्रश्न पडला. त्यावर असे सांगितले गेले की हे सूक्ष्म कण एकाच वेळी कण आणि तरंग या दोन्ही अवस्थांमध्ये असू शकतात.

फोटॉन किंवा इलेक्ट्रॉन यांना कण असे म्हणतांना कण या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्यायला हवा. कुठल्याही पदार्थाच्या अतीशय लहान तुकड्याला कण म्हणतात. चिमूटभर साखरेतले निरनिराळे कण डोळ्यांना दिसतात आणि बोटाने त्यांना वेगळे करता येतात. पण त्याची पिठीसाखर केली तर तिचे कण मात्र डोळ्यांनाही वेगवेगळे दिसत नाहीत आणि त्यातल्या एका कणाचा वेगळा स्पर्शही बोटाला जाणवत नाही, पण ते असतात. अंधाऱ्या खोलीत एखादा उन्हाचा कवडसा आला तर त्यात तरंगणारे धुळीचे कण दिसतात. ते कण आपल्या आजूबाजूच्या हवेत नेहमी असतातच, पण ते सूक्ष्म कण आपल्याला एरवी दिसत नाहीत. त्यांच्यावर तीव्र प्रकाशाचा झोत पडल्याने ते चमकतात आणि दिसतात.  फुलांपासून निघून सर्वत्र पसरणारे त्याच्या सुवासाचे सूक्ष्म कण डोळ्यांना दिसत नाहीत, पण त्यांच्याकडूनच आपल्या नाकाला फुलांचा सुगंध समजतो.  असे अनेक अदृष्य सूक्ष्म कण या जगात असतात.

हे भौतिक जग अत्यंत सूक्ष्म अशा असंख्य अणूंपासून बनलेले असून ते अणु अविभाज्य व अविनाशी असतात असे प्राचीन काळातल्या कणाद मुनींनी सांगितले होते. जॉन डाल्टन या शास्त्रज्ञाने सन १८०८ मध्ये प्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला तेंव्हा असेच विधान केले आणि त्या अणूंचे काही गुणधर्म सांगितले. पण हा अणू नेमका किती सूक्ष्म असतो हे जवळजवळ १०० वर्षांनंतर सन १९०९ मध्ये जीन पेरिन या शास्त्रज्ञाने सांगितले.  त्याच्या नियमांवरून असे दिसते की धुळीच्या एका कणामध्ये कित्येक अब्ज अणू सामावलेले असतात, इतका तो सूक्ष्म असतो.  पण अशा अतिसूक्ष्म कणांसाठी वेगळा शब्दच नसल्याने अणूलाही कणच म्हंटले जाते.

निरनिराळ्या मूलद्रव्यांच्या अणूंचा संयोग होऊन त्यातून संयुगांचे रेणू तयार होतात. तेही अदृष्य असे सूक्ष्म कणच असतात. ही क्रिया कशी होते याची कारणे शोधण्यासाठी अणूच्या अंतर्गत रचनेची मॉडेल्स तयार केली गेली. त्यातल्या सर्वात प्रसिद्ध रदरफोर्ड मॉडेलमध्ये असे दाखवले होते की अणूंच्या केंद्रात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स  असतात आणि  इलेक्ट्रॉन्स त्यांच्या सभोवती घिरट्या घालत असतात. अर्थातच त्या अणूचा लहानसा भाग असलेल्या इलेक्ट्रॉनलाही कणच म्हंटले गेले.   


रदरफोर्डच्या मॉडेलप्रमाणे हैड्रोजनच्या एका अणूमध्ये केंद्रभागी एक प्रोटॉन असतो आणि एक इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती फिरत असतो, तर युरेनियमच्या एका अणूच्या केंद्रात ९२ प्रोटॉन्स आणि १४३ किंवा १४६ न्यूट्रॉन्स  एकमेकांना चिकटून बसलेले असतात आणि ९२ इलेक्ट्रॉन्स सहा निरनिराळ्या कक्षांमध्ये फिरत त्यांना प्रदक्षिणा घालत असतात. बुध, शुक्र, पृथ्वी वगैरे ग्रह एकेकटेच सूर्याभोवती निरनिराळ्या कक्षांमध्ये फिरत असतात पण हे इलेक्ट्रॉन गटागटाने निरनिराळ्या कक्षांमध्ये फिरत असतात. कुठल्या कक्षेतून किती इलेक्ट्रॉन फिरतात हे सुद्धा ठरलेले असते. या सगळ्यांना फिरण्यासाठी भरपूर मोकळी जागा लागते. हे सगळे सामान्य माणसाच्या आकलनाच्या आवाक्याबाहेर आहे. सगळे अणु जर असे जवळ जवळ पूर्णपणे रिकामेच असतील तर अनेक अणु मिळून त्यामधून कणखर पदार्थ कसे तयार होत असतील हे समजत नाही. असली वर्णने रावणाची दहा तोंडे किंवा सहस्त्रार्जुनाच्या हजार हातांसारखी अविश्वसनीय वाटतात. अणूची अंतर्गत रचना खरोखरच अशी असतेच असे कुठल्याही उपकरणातून दाखवता येणे शक्यच नाही. पण विशिष्ट क्रियांचा अभ्यास करण्यासाठी कल्पनेने अशी मॉडेल्स रचून त्यानुसार संशोधन करून त्या पदार्थाच्या इतर गुणधर्मांविषयी काही निष्कर्ष काढायला मदत होते. या युरेनियम अणूचे विखंडन केले तर त्यातून प्रचंड ऊर्जा कशी प्रकट होते हे सांगता येते. प्रत्यक्षात अशा प्रकारे अणुशक्ती निर्माण होते हे तर आपण पाहतोच. कार्बन, ऑक्सीजन, सोखंड, सोने वगैरे सर्व मूलद्रव्यांच्या निरनिराळ्या गुणधर्मांचा अभ्यास अशा प्रकारच्या मॉडेल्सवरून सुकर झाला आहे. दोन मूलद्रव्यांमध्ये रासायनिक क्रिया कशा होतात याचे स्पष्टीकरण या मॉडेल्समधून देता येते. म्हणून अणूची रचना अशीच असते असे शिकवले जाते.

प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या अणूच्या केंद्रस्थानी असलेल्या कणांमध्ये अणूचे ९९.९ % पेक्षा अधिक वस्तुमान असते. उरलेले ०.१% पेक्षाही कमी वस्तुमान सर्व इलेक्ट्रॉन्सचे मिळून असते. पण प्रोटॉनच्या एक सहस्त्रांशाहूनसुद्धा लहान असलेल्या पिटुकल्या इलेक्ट्रॉनमध्ये प्रोटॉनइतकाच इलेक्ट्रिक चार्ज असतो. हे प्रतापी कण निव्वळ चैतन्यमूर्ती असतात. ते सतत प्रचंड वेगाने निरनिराळ्या कक्षांमधून केंद्रभागाला प्रदक्षिणा घालत असतातच, त्यांचा काही प्रमाणात पूर्ण अणूवर प्रभाव पडतो. सर्वात बाहेरच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात त्यावरून त्या अणूची व्हॅलेन्सी ठरते. कुठल्याही अणूचा कुठल्या दुसऱ्या अणूशी किती प्रमाणात संयोग व्हावा हे त्या  व्हॅलन्सीनुसार ठरते. त्या संयुक्त पदार्थाचा अणू तयार होत असतांना दोन मूलद्रव्यांमधले इलेक्ट्रॉन्स एकमेकांशी हितगूज करून त्या पदार्थाचे नवे गुणधर्म ठरवतात, तो आम्ल असावा की अल्कली की निष्पक्ष हे ठरवतात.  या इलेक्ट्रॉन्सना अधिक ऊर्जा मिळाली की ते आपली कक्षा बदलतात. हे करत असतांना त्यातून प्रकाशकिरणांचे उत्सर्जन होते. या इलेक्ट्रॉन्सचे वायरसारख्या कुठल्याही वाहकामधून फिरणे म्हणजे विजेचा प्रवाह असतो. 

पदार्थ या शब्दाची विज्ञानात अशी व्याख्या केली जाते की त्याला वस्तुमान असते आणि तो जागा व्यापतो. Matter is defined as anything that has mass and takes up space. कण हा पदार्थाचाच बारीक भाग असल्यामुळे त्यालाही वस्तुमान असते आणि तो जागा व्यापतो. अणू हा पदार्थाचाच सूक्ष्म भाग असतो आणि इलेक्ट्रॉन हा त्याचा आणखी सूक्ष्म भाग असतो असे समजले तर त्याला कण असे समजता येईल. अणू आणि इलेक्ट्रॉन यांच्या वस्तुमानांचे आकडेही काढले गेले आहेतच.

संथ पाण्यामध्ये एक दगड टाकला की लगेच त्यावर लाटा उठून त्या पुढेपुढे सरकतांना दिसतात, पण लक्ष देऊन पाहिले तर खरे तर पाणी जागच्या जागीच वर खाली होत असते हे समजते. अशा प्रकारच्या हालचालीला तरंग म्हंटले जाते. पाण्यावरचे तरंग उठण्यासाठी आधी तिथे पाणी असावेच लागते. पण प्रकाशकिरण अवकाशाच्या निर्वात पोकळीतूनही दूरवरचा प्रवास करत असले तरी त्यांना तरंग असे नाव दिले गेले. ते अदृष्य अशा विद्युतचुंबकीय क्षेत्रामधले तरंग असतात.  या तरंगांमधून ऊर्जा वहात असते हा त्याचा महत्वाचा गुण असतो.

In physics, mathematics, engineering, and related fields, a wave is a propagating dynamic disturbance (change from equilibrium) of one or more quantities.  In physics, a wave is a disturbance that transfers energy.

आता ऊर्जा म्हणजे काय? ती म्हणजे कार्य करण्याची क्षमता.  Energy is the capacity for doing work. विज्ञानामध्ये कुठल्याही कामाला कार्य समजले जात नाही. बलामधून जितकी ऊर्जा दिली किंवा घेतली जाते ते कार्य अशी त्याची व्याख्या आहे. 

In science, work is the energy transferred to or from an object via the application of force along a displacement. 

उदाहरणार्थ आपण जमीनीवरून पिशवी उचलून हातात घेतली तर तिला स्थितिज ऊर्जा (Potential energy) देतो, ते कार्य झाले. पण हातातली पिशवी सोडली तर ती गुरुत्वाकर्षणाने आपोआप खाली येते.  तिला वेग येतो तेंव्हा तिच्यातल्या स्थितिज ऊर्जेचे रूपांतर गतिक ऊर्जेत (Kinetic Energy) होते.    ऊर्जेचे इतरही प्रकार आहेत, उदाहरणार्थ ऊष्णता या प्रकारच्या ऊर्जेने वस्तूचे तापमान वाढते. सूर्याच्या प्रकाशकिरणांमधूनही ऊर्जा वहात असते. 

एकोणिसाव्या शतकात कण की तरंग असा वाद होता. विसाव्या शतकात त्याऐवजी पदार्थ की ऊर्जा असे नवे द्वैत सुरू झाले.

 सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षण आणि गतींचे कायदे हे सर्वाधिक महत्वाचे शोध लावले. प्रकाशकिरण हे कण असतात असेही त्यांनी सांगितले होते, पण ख्रिश्चन हुजेन्स या समकालिन शास्त्रज्ञाने असे सांगितले की  प्रकाश हा तरंगांच्या स्वरूपातच इकडून तिकडे जातो. इंटरफरन्स या प्रकाशाच्या गुणधर्माचा शोध लागल्यानंतर त्या लहरीच असतात हे पक्के झाले. समुद्रसपाटीवर हवेचा दाब जास्त असतो आणि पर्वतशिखरावर तो कमी असतो यावरून गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताला आधार मिळाला. पृथ्वी हवेलाही आपल्याकडे खेचून घेत असल्यामुळे असे होते.  हवेच्या दाबांचा जास्त अभ्यास केल्यावर हे समजले की जमीनीपासून शंभरदीडशे किलोमीटर्सच्या पलीकडे वातावरणातली हवा जवळजवळ नसतेच. तिथे निर्वात पोकळी असते. सूर्य आणि चंद्र हे त्याच्या पलीकडे पृथ्वीपासून कितीतरी दूर असतात हेसुद्धा समजले होते. मग त्यांच्यापासून निघणाऱ्या प्रकाशाच्या लहरी कुठल्या माध्यमामधून इकडे येत असतात? या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी असा तर्क सांगितला गेला की विश्वात सगळीकडे ईथर नावाचा एक अदृष्य पदार्थ भरलेला असावा आणि त्यातून या प्रकाशलहरी पसरत जातात. मग ईथरचे अस्तित्व शोधायचे प्रयत्न सुरू झाले.

मोटारीमधून वेगाने पुढे जात असतांना उलट दिशेने वारा वहात आहे असे आपल्याला वाटते. मग पृथ्वी स्वतःभोवती फिरत असतांना सगळीकडे उलट दिशेने वारे का वहात नाहीत? पृथ्वीबरोबर हवेलाही मोमेंटम मिळाले असल्यामुळे हवाही पृथ्वीबरोबरच फिरत असावी. मग पृथ्वीजवळचा ईथरचा थरसुद्धा असा फिरत असतो का? जर तसे असेल तर न्यूटनच्या नियमांप्रमाणे जे किरण त्याच्या फिरण्याच्या दिशेने येतात त्यांची गति वाढायला पाहिजे आणि जे त्याच्या विरुद्ध दिशेने येतात त्यांची गति कमी व्हायला पाहिजे, तसेच त्याच्या काटकोनामध्ये येणाऱ्या किरणांची गति या दोन्हींच्या मध्ये असली पाहिजे. इंटरफरन्स या प्रकाशाच्या गुणधर्माचा उपयोग करून किरणांच्या गतींमधला हा सूक्ष्म फरक समजून घेणे शक्य आहे असे शास्त्रज्ञांना वाटले. 

मायकेलसन आणि मोर्ले या दोन अमेरिकन शास्त्रज्ञांनी यासाठी केलेला प्रयोग त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांनी आधी केलेल्या निरीक्षणांवर अविश्वास दाखवला गेला, त्यांच्या उपकरणांमधल्या उणीवा  दाखवल्या गेल्या. सातआठ वर्षे खपून त्यांनी सगळ्या तृटी दूर करून केलेल्या प्रयोगांमध्येही त्यांना किरणांच्या गतींमध्ये कुठलाच फरक दिसला नाही. अफाट खर्च आणि अविश्रांत मेहनत करून केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर सुद्धा ज्या गोष्टीचा शोध घेतला होता ती सापडलीच नाही. पण या न सापडण्यामुळेच विज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली.

मायकेलसन आणि मोर्ले या दोन अमेरिकन शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगानंतर ईथरच्या अस्तित्वाबद्दल दाट शंका वाटायला लागल्या. वैज्ञानिकांच्या जगातल्या एका अंधश्रद्धेचा हळूहळू लोप होत गेला. आल्बर्ट आइनस्टाइन या शास्त्रज्ञाने न्यूटनच्या गतीच्या सिद्धांतावरच प्रश्न उपस्थित केले. त्याने विशेष सापेक्षतावादाचा सिद्धान्त जून ३०, इ.स. १९०५ रोजी मांडला. त्या सिद्धान्तामध्ये त्याने दाखवून दिले की सर आयझॅक न्यूटन यांनी सांगितलेल्या गतीच्या नियमांनुसार विद्युत-चुंबकीय लहरींची (यामध्ये प्रकाशकिरणांचादेखील समावेश होतो) वागणूक स्पष्ट करता येत नाही. त्या परिस्थितीचे विश्लेषण, स्पष्टीकरण आणि अनुमान आइन्स्टाइनने सापेक्षतावादाच्या विशेष सिद्धान्तात केले. या सिद्धान्तांनुसार विद्युत-चुंबकीय लहरींचा वेग सापेक्ष परिस्थितीमध्ये नेहमी स्थिर असतो आणि निरीक्षकाच्या वेगावर आणि स्थळावर अवलंबून नसतो. थोडक्यात (न्यूटनच्या गतीच्या नियमांनुसार) संदर्भाची निरपेक्ष चौकट (Frame of Reference) ही निरीक्षकाकडे न राहता सापेक्षतेच्या सिद्धान्तानुसार प्रकाशाचा निर्वात क्षेत्रातील वेग हाच ती निरपेक्ष चौकट बनला.

सोप्या शब्दात सांगायचे झाले तर समजा आपण कारमध्ये बसून दर तासाला ८० किलोमीटर वेगाने निघालो आणि समोरून येणारी गाडीही ८० किमीच्या वेगाने येत असेल तर आपल्याला ती १६० किमी वेगाने येत आहे असे वाटते. हे न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणेही बरोबरच आहे आणि असेच घडत असते.  जर सुरुवातीला आपण दोघेही एकमेकांपासून १६० कि.मी. इतक्या अंतरावर असू तर एक तासानंतर एकमेकांना अमोरासमोर येऊन भेटू.  पण जर कोणी प्रकाशकिरणांच्या वेगाने जात असेल आणि समोरून येणाराही तितक्याच वेगाने येत असेल तरीही त्या दोघांनाही समोरून येणारा प्रकाशाच्या इतक्या वेगानेच येतांना दिसेल. प्रकाशाच्या दुप्पट वेगाने नाही. हे समजायला जड आहे, कारण अंतर आणि समय याबद्दल आपल्या मनातल्या कल्पना दृढ असतात. पण  आइनस्टाइनने सांगितले की या गोष्टी सापेक्ष असतात. त्याने काही प्रयोगांमधील निरीक्षणे आणि उच्च गणितातल्या किचकट आकडेमोडीच्या आधाराने तसे सिद्ध करून दाखवले आणि इतर शास्त्रज्ञांना पटवून दिले. त्याचे सिद्धांत आधुनिक काळातल्या भौतिक शास्त्रातले प्रमुख पायाभूत सिद्धांत झाले.

काही लोकांना वाटते तसे आइनस्टाइनने न्यूटनच्या सिद्धांतांना खोटे ठरवलेले नाही. सायकल, मोटार, आगगाडी किंवा अगदी विमानेसुद्धा जितक्या वेगाने जातात त्यांची गणिते आजही  न्यूटनच्या सूत्रांनुसारच केली जातात आणि त्यांची उत्तरे अचूकच येतात. पण प्रकाशाच्या वेगाइतक्या प्रचंड वेगाने धावणाऱ्या सूक्ष्म कणांसाठी आइनस्टाइनने  न्यूटनच्या सूत्रांमध्ये थोडा बदल करून वेगळी समीकरणे मांडली, त्याने न्यूटनच्या नियमांमध्ये भर टाकली. 

 सरळ रेषेत निरंतर वेगवान हालचाली करणाऱ्या वस्तूंसाठी जागा आणि वेळ कसा जोडला जातो हे विशेष सापेक्षतेचा सिद्धांत स्पष्ट करतो. यात जागा आणि वेळ यांच्यातले एका प्रकारचे अद्वैत दाखवले गेले आहे.  तो सिद्धांत फक्त ज्या वस्तू जवळपास प्रकाशाच्या वेगाने हालचाल करतात त्यांच्याशी संबंधित आहे. सरळ शब्दात सांगायचे झाले तर एखादी वस्तू प्रकाशाच्या गतीच्या जवळ येते, त्यावेळी त्याचे वस्तुमान असीम होते आणि तो प्रकाशापेक्षा वेगवान होऊ शकतच नाही. भौतिकशास्त्रामध्ये ही वैश्विक गती मर्यादा बऱ्याच चर्चेचा विषय ठरली आहे. पण विस्तीर्ण अंतर कसे चुटकीसरशी पार करावे याबद्दल  कपोल कल्पित साहित्यात विचार केला जातो. टाइममशीनमध्ये बसून भूतकाळात जाण्यावरही असंख्य गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत आणि काही सिनेमेही निघाले आहेत.

सूर्यप्रकाश आपल्या चांगला ओळखीचा आहे. दुसरी कुठलीही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट नसते. हा प्रकाश लोलकामधून पार होतांना त्यातले सात रंग दिसतात, कधीकधी ते रंग इंद्रधनुष्याच्या रूपाने आकाशात मोठी कमान टाकतात. त्यांच्या आजूबाजूला असलेले अल्ट्राव्हायोलेट आणि इन्फ्रारेड नावाचे अदृष्य किरण शास्त्रज्ञांनी शोधून काढले आणि उपयोगात आणले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला कॅथोड रे ट्यूब आणि क्ष किरण (एक्स रे)यांचे शोध लागले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मादाम मेरी क्यूरी यांनी रेडिओअॅक्टिव्हिटीवर संशोधन करून नोबेल प्राइझ मिळवले आणि हे पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ असा मानही मिळवला. रेडिओअॅक्टिव्हिटीमध्ये  अल्फा, बीटा आणि गॅमा या नावांचे तीन प्रकारचे किरण असतात.  

या सगळ्या अदृष्य किरणांमधले क्ष किरण हेसुद्धा सूर्यप्रकाशासारखेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतात, पण ते आपली त्वचा आणि मज्जा वगैरेंच्या आरपार जाऊ शकतात आणि आतल्या हाडांची चित्रे दाखवतात. गॅमा रेज तर त्यांच्यापेक्षाही भेदक असतात आणि लोखंडाच्या पार जातात. तरी तेसुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतात म्हणजे तरंग असतात.

कॅथोड रे म्हणजे मात्र कॅथोडकडून अॅनोडच्या दिशेने होत असलेला इलेक्ट्रॉन्स या कणांचा वर्षाव असतो.  कॅथोड आणि अॅनोड यांच्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रिक व्होल्टेजच्या  दाबामुळे हे इलेक्ट्रॉन कॅथोडमधून बाहेर ढकलले जातात आणि अॅनोडच्या दिशेने धाव घेतात. बीटा रे हेसुद्धा अधिक ऊर्जावान असे इलेक्ट्रॉन असतात. ते थेट अणुगर्भामधून बाहेर पडतात आणि सुसाट धावत सुटतात. ते माणसाच्या त्वचेला पार करू शकण्याएवढे भेदक असतात. अल्फा रेमध्ये हीलियम या मूलद्रव्याचे आयॉन असतात, म्हणजे हीलियमच्या अणूच्या केंद्रस्थानी असलेले दोन प्रोटॉन आणि दोन न्यूट्रॉन यांच्या जोड्या असतात. अशा चार कणांनी मिळून तयार झालेला अल्फा हा कण कागदालासुद्धा भेदू शकत नाही. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या अल्फा रेपासून काही हानी होत नाही. पण अल्फा किंवा बीटा रे यांचे स्रोत असलेला एखादा रेडिओअॅक्टिव्ह  पदार्थ श्वासामधून किंवा अन्नपाण्यामधून शरीरात गेला तर तो घातक ठरतो. गॅमा रे तर शरीराच्या आरपार जातातच आणि जात असतांना वाटेत थोडा विध्वंस करून जातात. म्हणून या तीन्ही प्रकारच्या विकिरणांपासून सावध रहाण्याची आवश्यकता असते.

हे थोडे विषयांतर झाले. कॅथोड रे, अल्फारे आणि बीटा रे हे किरण असले तरी ते निर्विवादपणे कण असतात हे त्यांचे द्वैत आणि किरणसुद्धा फोटॉन या कणांमधून तयार होतात हे अद्वैत.

मी सुरुवातीच्या एका भागात लिहिले होते की सर आयझॅक न्यूटन या प्रसिद्ध शास्त्रज्ञाने असे सांगितले होते की प्रकाशकिरणांचे सूक्ष्म कण असतात.  त्याच्याच काळातल्या डच फिजिसिस्ट ख्रिश्चन हुजेन्स याने असे सांगितले की  प्रकाश हा तरंगांच्या स्वरूपात इकडून तिकडे जातो. तोपर्यंत डाल्टनचा जन्मसुद्धा झाला नव्हता आणि अणू, रेणू, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन हे शब्दही कुणाला माहीत नव्हते. त्या काळात कण की तरंग एवढाच वाद होता. तो दोनशे वर्षे चालला. अखेर किरण हे कणही आहेत आणि तरंगही आहेत अशा द्वैतावर सहमति झाली.

त्या धाग्यावरून पुढे जातांना मी मागील भागात काही इतर प्रकारच्या किरणांची (रेजची) उदाहरणे दिली होती. त्यातले काही रेडिओअॅक्टिव्हिटीशी संबंधित आहेत. ते नीट समजावे  म्हणून या भागात मी त्याबद्दल वेगळे लिहिणार आहे. मादाम मेरी क्यूरी या शास्त्रज्ञाने प्रयोगशाळेत असे दाखवून दिले की रेडियम सारख्या काही पदार्थांमधून वेगळ्याच प्रकारचे अदृष्य किरण बाहेर पडत असतात. इतर काही शास्त्रज्ञांनासुद्धा हे समजले होते. त्यांनी या दृष्टीने अनेक पदार्थांचा अभ्यास केला. या अदृष्य किरणांचे अस्तित्व ओळखण्यासाठी आणि त्यांचे गुणधर्म तपासण्यासाठी विविध प्रकारची संवेदनशील अशी उपकरणे तयार करून घेतली आणि या किरणांचा अभ्यास केला. त्या अभ्यासामधून त्यांनी या किरणांची अल्फा, बीटा आणि गॅमा अशा तीन प्रकारांमध्ये वर्गवारी केली.  या तीनही प्रकारांमध्ये कमीअधिक तीव्रता असलेले असंख्य प्रकारचे किरण असतात.

जगातील सर्वच मूलद्रव्यांचे आयसोटोप्स असतात. यातले बहुसंख्य आयसोटोप स्थिर असतात, पण काही आयसोटोप्सच्या केंद्रस्थानी (न्यूक्लियसमध्ये) सतत चलबिचल चाललेली असते. त्यामधून जास्तीची ऊर्जा या किरणांद्वारे बाहेर टाकली जात असते. अगदी आपल्या शरीराचे घटक असलेल्या काही मूलद्रव्यांमधूनसद्धा हे किरण सतत बाहेर पडत असतात आणि संवेदनशील उपकरणांनी ते मोजता येतात. तसेच अवकाशामधून येत असलेल्या कॉस्मिक रेजमध्येही सूक्ष्म प्रमाणात रेडिओअॅक्टिव्हिटी असतेच.  यामुळे या शब्दाने घाबरून जायचे कारण नाही. आपल्या रोजच्या आयुष्यात आपण काही युनिट्स रेडिएशन घेतच असतो आणि आपल्या शरीराला त्याची सवय झालेली असते. त्याला बॅकग्राउंड डोस म्हणतात. तोसुद्धा दररोज कमीजास्त होत असतो.

अणूबाँबमध्ये किंवा न्यूक्लियर रिअॅक्टर्समध्ये युरेनियमचे विखंडन होऊन काही नवे रेणू तयार होतात. या क्रियेमध्ये अत्यधिक प्रचंड प्रमाणात विकिरण होते, तसेच हे नवे रेणू अस्थिर असतात आणि दीर्घकाळ म्हणजे शेकडो वर्षे रेडिओअॅक्टिव्ह राहतात.  यामधून मिळणारा रेडिएशनचा डोस बॅकग्राउंड डोसच्या शंभर पट इतका झाला तर त्याचे किंचित परिणाम लगेच दिसतात आणि जर तो हजारपट किंवा लाखपट इतका झाला तर गंभीर परिणाम होतात. रिअॅक्टरमधील रेडिओअॅक्टिव्हिटीचा बाहेरील सामान्य जनतेला उपसर्ग होऊ नये याची विशेष काळजी घेतली जाते. त्यांना मिळणारा बॅकग्राउंड डोस सुरक्षित मर्यादेतच ठेवला जातो.  

इलेक्ट्रॉन हा सूक्ष्म कण प्रत्येक अणूचा भाग असतो आणि तो निरनिराळ्या क्रियांमध्ये अनेक प्रकारे काम करत असतो.  सर्व रासायनिक क्रिया त्याच्यामुळेच घडतात, तोच विजेच्या प्रवाहात तारेमधून वहात असतो, कॅथोड रे बनून सीआरओ स्क्रीनवर उजेड पाडतो आणि तोच बीटा रे झाला तर नुकसानही करतो.

 जगातले सर्व पदार्थ अणुरेणु नावाच्या सूक्ष्म कणांपासून बनलेले आहेत हे मान्य झाल्यानंतर या कणांचा थिऑरिटिकल अभ्यास सुरू झाला. त्यांची अंतर्गत रचना कशी असू शकेल आणि त्यांच्या अंतर्भागात काय काय गतिविधी चाललेल्या असतील यावर विचार करणे सुरू झाले. या गोष्टींचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे कुणालाही शक्य नव्हतेच. कल्पनेतून त्यांच्या आकृती काढून त्यांच्यावर चर्चा सुरू झाल्या. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला याला बहर आला. रदरफोर्ड आणि नील्स बोहर यासारख्या काही शास्त्रज्ञांनी आपापली मॉडेल्स मांडली. अणूच्या पोटात प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन नावाचे अतिसूक्ष्म कण असतात अशी कल्पना करून त्यांना निरनिराळे गुणधर्म दिले गेले. त्यातले इलेक्ट्रॉन्स लहान मोठे गट बनवून अणूच्या केंद्राच्या सभोवती वेगाने घिरट्या घालत असतात. ते निरनिराळ्या कक्षांमधून फिरत असतात. फिरता फिरता स्वतःभोवती गिरक्या घेत असतात, त्यातही लेगस्पिन आणि ऑफस्पिन बॉल जसे वेगवेगळ्या बाजूने वळतात तसे हे इलेक्ट्रॉन्सही दोन दिशांनी स्पिन करत असतात आणि मधूनच अणूच्या बाहेर पळून जातात. वगैरे अचाट कल्पना मांडल्या गेल्या.  या प्रत्येक कल्पनेच्या मागे काही तर्क होते, काही गणिते होती. प्रकाशाचेसुद्धा फोटॉन नावाचे सूक्ष्म कण असतात ही कल्पना पुढे आली. त्यांची इतर कणांशी टक्कर झाल्यानंतर, कुठल्या कणाचे पुढे काय होईल, कोण कुठे जाईल वगैरेंचे तर्क व्हायला लागले.

आल्बर्ट आइनस्टाइनने सापेक्षता सिद्धांत मांडला. त्याने असे दाखवून दिले की कोणीही प्रकाशाच्या वेगाच्या जवळपास इतक्या वेगाने धावत असेल तर त्याच्यासाठी अंतराचा (स्पेसचा) संकोच होतो, काळाची गती मंदावते आणि त्याचे वस्तुमान असंख्यपटीने वाढते. या सगळ्या गोष्टी आपल्या जगातल्या नेहमीच्या वस्तूंसाठी अतर्क्य किंवा अजब वाटतात, पण इलेक्ट्रॉन आणि फोटॉनसारख्या सूक्ष्म कणांसाठी त्या तशा घडत असाव्यात असे सांगितले गेले आणि ते तर्क मान्य केले गेले. 

मॅक्स प्लँक या शास्त्रज्ञाने असे दाखवून दिले की  भिन्न अणू आणि रेणू एका वेळी केवळ वेगवेगळ्या ठराविक प्रमाणातच ऊर्जा उत्सर्जित करू शकतात किंवा शोषून घेऊ शकतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या स्वरूपात उत्सर्जित किंवा शोषली जाऊ शकणारी सर्वात कमी ऊर्जा क्वांटम म्हणून ओळखली जाते. सोपे उदाहरण द्यायचे झाल्यास प्रेशर कुकरमधल्या वाफेचा दाब एका मर्यादेपर्यंत वाढला की शिटी वाजते, थोडी वाफ बाहेर पडते आणि थांबते, तो दाब पुन्हा वाढला की ती पुन्हा वाजते, पुन्हा थोडी वाफ बाहेर पडते असे होत राहते. अणूमधल्या अंतर्गत हालचालींमधील ऊर्जा वाढत असतांना एकेका क्षणी ठराविक क्वांटम इतकीच ऊर्जा  किरणाच्या रूपात बाहेर फेकली जात असते. हा क्षण अतीशय सूक्ष्म म्हणजे एका सेकंदाच्या अब्जांश भागाच्या अब्जांश भागापेक्षाही लहान असू शकतो.

अणूंमधल्या कणांच्या हालचाली आणि त्यांचेमधून बाहेर टाकली जात असलेली ऊर्जा यांची काही सूत्रे सांगितली गेली आणि गणिते मांडली गेली, पण त्यामधूनही पूर्णपणे सुसंगत उत्तरे येत नव्हती. हिसेनबर्ग नावाच्या शास्त्रज्ञाने अनिश्चिततेचाच एक सिद्धांत (अनसर्टन्टी प्रिन्सिपल) मांडला. त्याने असे सांगितले की वेगाने धावणाऱ्या कणाचे स्थान किंवा वेग यातले एकच निश्चितपणे सांगता येईल आणि दुसरे अनिश्चित असेल.  आपली मोटार किती किलोमीटर चालली आहे आणि ती किती वेगात धावत आहे हे दोन्ही दाखवणारी उपकरणे आपल्या मोटारीत असतात, पण या कणांबाबात तसे नसते. जिथे अंतरे आकुंचन पावतात आणि काळ मंदगतीने चालतो तिथे नेमका वेग कसा ठरवणार ? अशा सगळ्या अजब वाटणाऱ्या गोष्टींचा कसून अभ्यास करण्यासाठी क्वांटम मेकॅनिक्स, क्वांटम फिजिक्स, क्वांटम केमिस्ट्री यासारखी विज्ञानाची नवनवी दालने उघडली गेली. यातली गणिते साधी सोपी नसतात, त्यातली गुंतागुंतीची पार्शल डिफरन्शिएट इक्वेशन्स सोडवणे फक्त त्यातल्या तज्ञांनाच शक्य असते. त्यांनी काढलेले अजब वाटणारे निष्कर्ष कधीकधी तुलनेने सोप्या भाषेत सांगितले जातात.

"जे न देखे रवी ते देखे कवी" असे म्हणतात. त्याचा शब्दशः अर्थ न घेता असे समजले जाते की कवींना अचाट कल्पनाशक्ती असते, इतरांना जाणवत नाहीत अशा संवेदना कविमनाला स्पर्श करतात, वगैरे. याचप्रमाणे असेही म्हणता येईल की इतरांना न दिसणाऱ्या काही गोष्टी शास्त्रज्ञांच्या  दिव्यदृष्टीला दिसतात. उदाहरणार्थ सपाट आणि अचला वाटणारी पृथ्वी प्रत्यक्षात चेंडूसारखी गोलाकार आहे, ती स्वतःभोवती गिरक्या घेत सूर्याभोवती फिरते यासारख्या गोष्टी पृथ्वीवर राहणाऱ्या इतर लोकांना दिसत नाहीत, पण शास्त्रज्ञांना त्या प्रत्यक्षात न दिसूनसुद्धा त्यांच्या बुद्धीला समजल्या आणि त्यांनी त्या बाकीच्या लोकांना समजावून सांगितल्या. त्याचप्रमाणे रिलेटिव्हिटी थिअरी किंवा क्वांटम मेकॅनिक्स यांचे आकलन अजूनही सामान्य लोकांना होत नसले तरी शास्त्रज्ञांनी  त्यामधून पुढे खूप संशोधन केले आणि ते अजून करत आहेत.   

 "विसंगतीमधून विनोद निर्माण होतो" असेही म्हंटले जाते. सामान्य लोक त्या विनोदावर क्षणभर हसून मोकळे होतात. पण शास्त्रज्ञ लोक त्यांना दिसलेल्या विसंगतीच्या मुळाशी जाऊन तिचे कारण शोधण्याचा कसून प्रयत्न करतात. यातून त्यांना आणखी माहिती मिळते आणि विज्ञान पुढे जाते. कुठल्याही पदार्थातले सगळे अणू एकसारखेच असतात असे आधी समजले गेले होते, पण काही पदार्थांच्या  गुणधर्मांमध्ये दिसलेल्या किंचित विसंगतीवरून शोध घेतल्यावर नवे पदार्थ सापडत गेले. उदाहरणार्थ हैड्रोजनमध्येच ड्युटोरियम आणि ट्रिशियम नावाचे त्याचे आणखी दोन आयसोटोप मिसळलेले असतात. त्यांनी हे आयसोटोप वेगळे करून दाखवले आणि त्यांचे महत्वाचे उपयोगही करायला सुरुवात केली. 

रेडिओअॅक्टिव्ह पदार्थांचे सगळे अणू एकसारखे असले तरी एका वेळी त्यातल्या थोड्या थोड्या अणूंचे विघटन होऊन त्यांच्यामधून अल्फा, बीटा, गॅमासारखे किरण बाहेर पडत असतात. अशा प्रकारे केंव्हा कुठल्या अणूंचे विघटन होईल हे माहीत नसते, पण ते अमूक इतक्या दराने होत राहू शकेल याचा अंदाज  अभ्यासामधून काढला जातो.  अशा प्रकारे अनिश्चिततेच्या जोडीने संभाव्यता (Probability) हा आणखी एक शब्द आधुनिक विज्ञानात आला.

तसेच हैड्रोजनच्या दोन अणूंचे संलयन (Fusion) होऊन त्यातून हीलियमचा अणू जन्माला येतो आणि प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते या क्रियेमुळे सूर्यासारख्या असंख्य ताऱ्यांमधून प्रकाशकिरण बाहेर पडून विश्वभर पसरतात हे इथल्या शास्त्रज्ञांना त्यांच्या अभ्यासामधून समजले. अशा प्रकारे प्रचंड ऊर्जा निर्माण करण्याच्या क्रियेचे प्रात्यक्षिकही त्यांनी हैड्रोजन बाँबमधून दाखवले. पण सूर्यामध्ये असलेले हैड्रोजनचे असंख्य अणू एकदम स्फोट करत नाहीत, सतत त्यातले थोडे थोडे अणू या क्रियेत भाग घेत असतात तरीही त्यामधून इतकी प्रचंड ऊर्जा तयार होते. हे काम कोट्यवधि वर्षांपासून होत आले आहे आणि पुढील कोट्यवधि वर्षे चालत राहणार आहे. पण सूर्यासारखे इतर काही तारे मात्र काही अब्ज वर्षांनंतर विझून गेले किंवा त्यांचे रूपांतर दुसऱ्या कुठल्या तरी प्रकारच्या ताऱ्यांमध्ये झाले वगैरे सुरस कथा हे शास्त्रज्ञ सांगतात. या काल्पनिक कथा नसून तसे अभ्यासामधून सिद्ध झालेले आहे हे सांगायला ते विसरत नाहीत. गेल्या शंभर वर्षात झालेली विज्ञानामधील काही विषयांमधली प्रगती अशा प्रकारची आहे.

गेल्या शंभर सव्वाशे वर्षांमध्ये विज्ञानामधले मूलभूत संशोधन आपल्या अनुभवविश्वाच्या पार पलीकडल्या क्षेत्रांमध्ये होत आले आहे.  प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स या तीन मूलभूत सूक्ष्म कणांना मान्य केल्यानंतर त्यांचे विविध गुणधर्म तपासून पहाण्यासाठी त्यांनी आणखी अधिकाधिक खोलात जाऊन पुढील संशोधन आणि विचारचक्र सुरू ठेवले. न्यूट्रिनोज, अँटिन्यूट्रिनोज, मेसॉन्स, पियॉन्स, म्युऑन्स, केऑन्स, हेड्रॉन्स, क्वार्क्स, अँटिक्वार्क्स, बोसॉन्स, फर्मिऑन्स वगैरे नावांचे आणि त्यांचे उपप्रकार असलेले कित्येक  अतिसूक्ष्म कण यामधून पुढे येत गेले. यातले बरेचसे कण अत्यंत अल्पजीवी असतात. काही कारणाने ते निर्माण होतात आणि आणि लगेच दुसऱ्या एकाद्या कणात विलीन होऊन जातात, पण त्यापूर्वी आपला ठसा उमटवून जातात. त्या परिणामावरूनच ते येऊन गेल्याची माहिती कळते. काही कण खूप शक्तिशालीही असतात. ते आपल्या नकळत आपल्या शरीरातून आरपार जात असतात, पण आपल्याला ते समजतसुद्धा नाही.  हे सगळे विज्ञानच आपल्यासाठी अगम्य आहे.

पण उपयोजित विज्ञानामधल्या संशोधनामुळे मात्र जगभरातल्या लोकांचे जीवन पार बदलून टाकले आहे. प्रकाशकिरण आणि इलेक्ट्रॉन्स यांच्या परस्परसंबंधावर संशोधन करतांना प्रकाशाचे रूपांतर वि‍जेमध्ये आणि विजेचे रूपांतर प्रकाशामध्ये करता यायला लागले आणि त्यामधून अनंत अजब गोष्टी करता येणे शक्य झाले.  क्वांटम मेकॅनिक्ससारख्या अगम्य विषयामधल्या संशोधनातूनच लेजर, सेमिकंडक्टर्स, एमआरआय यासारख्या गोष्टी आल्या, इलेक्ट्रॉनिक्समधून पुढे मायक्रोचिप्स आल्या. त्यांनी युक्त असलेला घरातला संगणक किंवा खिशातला मोबाइल फोन अशा गोष्टींची मी पूर्वी कल्पनासुद्धा केली नव्हती, पण आज त्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत. यांच्या मागचे विज्ञानही अगम्यच असले तरी त्यांचा उपयोग तर खरा आहे. 

कण आणि तरंग किंवा पदार्थ आणि ऊर्जा यांच्यात द्वैत असो वा अद्वैत असो, त्या चर्चेमधून झालेल्या प्रगतीचा किती फायदा आपल्याला होत आहे हे महत्वाचे आहे. 

(समाप्त)












Friday, November 22, 2024

सर्वाधिक श्रीमंत कोण ?

 १५ ऑगस्ट १९४७ला आपला देश स्वतंत्र झाला तेंव्हा या देशात पाचशेहून जास्त संस्थाने होती.  या संस्थानांचे राजे, महाराजे, नवाब वगैरे लोकांकडे अमर्याद सत्ता आणि साधनसंपत्ती होती. सरदार वल्लभभाई पटेलांनी जोर लावून या सगळ्या संस्थानांचे भारतात विलिनीकरण करून घेतले तेंव्हा प्रत्येक संस्थानिकाबरोबर एक करार केला गेला. या करारानुसार त्यांची राज्ये खालसा केली गेली त्यामुळे त्यांची राजकीय सत्ता शिल्लक राहिली नाही, ते सत्ताधीश राजे न राहता या देशाचे सामान्य नागरिक झाले, पण त्यांची बरीचशी संपत्ती मात्र त्यांच्याकडेच राहिली. संस्थानातल्या अनेक वास्तू, जमीनी, कपडेलत्ते, दागदागीने वगैरे मालमत्ता त्यांनी स्वतःच्या किंवा आपल्या कुटुंबियांच्या नावांवर त्यांची खाजगी मालमत्ता करून आपल्याच ताब्यात ठेवली. शिवाय त्या लोकांना चैनीत राहता येण्यासाठी सरकारकडून प्रीव्हीपर्स नावाचा घसघशीत तनखा सुरू झाला. यामुळे त्या वेळी बरेचसे संस्थानिक चांगले गडगंज श्रीमंत होते. या लोकांचे राजवाडे, जमीनजुमला, त्यांच्याकडचे सोनेनाणे, हिरे, माणके, मोती  वगैरेंची गणनाही केली नसेल आणि त्यांची किंमत कशी ठरवणार? कुठलीही वस्तू जर विकली असेल तरच त्या खरेदी आणि विक्री व्यवहारात त्याची किंमत ठरते. राजवाडे आणि हिरे माणके अशा गोष्टी सहसा खुल्या बाजारात विकल्या जात नाहीत, त्यांची नेमकी किंमत सांगता येत नाही. यामुळे  ते संस्थानिक लोक खूप खूप धनाढ्य होते एवढेच सांगता येईल.


त्यांची एकमेकांशी तुलना करून कोण सर्वात जास्त श्रीमंत असे ठरवणे कठीण असले तरी असे सांगितले जाते की हैदराबादचा निजाम मीर उस्मान अली खान हा त्या काळातला सर्वात जास्त श्रीमंत होता. त्याचे अनेक राजवाडे आणि महाल तर होतेच, दोनतीनशे वर्षांपासून जमवलेली अपार संपत्ती होती, शिवाय त्याच्या राज्यात गोवळकोंड्याला हिऱ्याची खाणच होती आणि त्यातून निघालेले एकेक हिरे अनमोल होते. हा निजाम लाखों रुपयांचा एक मोठा हिरा पेपरवेट म्हणून वापरत होता असे म्हणतात. १९३७ साली टाइम मासिकाने त्याचा फोटो संपूर्ण जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून त्याच्या मुखपृष्ठावर छापला होता. १९४७मध्ये हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालेले नसल्यामुळे त्याच्याच मालकीचे होते. क्षेत्रफळ आणि लोकसंख्येचा विचार करता ते संस्थान युरोपमधल्या एकाद्या देशाइतके मोठे होते. त्यामुळे त्या काळातला हैदराबादचा निझाम हा  निःसंशय सर्वाधिक श्रीमंत होता. काश्मीर, म्हैसूर, जयपूर, बडोदा यासारख्या इतर ठिकाणचे संस्थानिकसुद्धा श्रीमंतच होते, पण ते निझामाइतके श्रीमंत नसतील. 


ब्रिटिश राजवटीतच भारतातले काही यशस्वी व्यापारी आणि उद्योगपती हे सुद्धा खूप श्रीमंत झाले होते. यात टाटा आणि बिर्ला आघाडीवर होते. तेंव्हाही वालचंद, किर्लोस्कर, साराभाई, वाडिया, गोदरेज, बजाज यांच्यासारखे आणखी काही उद्योगपती होते पण ते टाटाबिर्लांच्या तोडीचे नसावेत. त्यामुळे मी लहानपणापासूनच टाटाबिर्ला या जोडीचेच नाव ऐकत होतो. जमशेदजी टाटा यांनी ब्रिटिशांच्या काळातच भारतात पहिला लोखंडाचा मोठा कारखाना काढला होता आणि त्या गावालाच जमशेदपूर हे नाव दिले होते. त्याच्याही आधी त्यांनी मुंबईत कापडाची गिरणी काढली होती. पुढे टाटा कंपनीने लोणावळ्याजवळ धरण बांधून खोपोलीला विद्युतकेंद्र बांधले आणि मुंबईला वीजपुरवठा सुरू करून दिला, मुंबईत भव्य ताजमहाल हॉटेल बांधले, तेलसाबणाचे, मिठाचे, आगगाडीच्या इंजिनांचे तसेच ट्रक्स, बसेस वगैरेंचेही कारखाने काढले होते, टाटांनीच भारतातली पहिली विमान कंपनी काढली होती. अशा सगळ्या कंपन्या अत्यंत कार्यक्षमतेने चालवून त्यांनी 'टाटा' या नावाला एक उत्कृष्ट गुणवत्तेचे प्रतीक असा लौकिक मिळवून दिला होता.  सर जमशेदजी टाटा यांच्यानंतरच्या काळात कोण कोण या समूहाचे संचालन करत होते त्यांची नावे आज त्यांच्याइतकी प्रसिद्ध नाहीत. माझ्या लहानपणीच्या काळात त्या समूहाचे प्रमुख असलेले श्री.जे आर डी टाटा हे भारतातले सर्वात मोठे उद्योगपती होते. श्री.नवल टाटाही प्रसिद्ध होते. 


श्री.घनश्यामदास बिर्ला यांनीही कापडाच्या गिरण्या, मोटारीचा कारखाना, सिमेंटचे कारखाने, कागदाचे कारखाने यासारखे अनेक उद्योग धंदे यशस्वीपणे सुरू करून ते नावारूपाला आणले होते, पण त्या कंपन्यांच्या नावांमध्ये किंवा उत्पादनांच्या नावातही सहसा कुठे 'बिर्ला' असा उल्लेख नसल्यामुळे 'टाटा'सारखा 'बिर्ला' ब्रँड तयार झाला नव्हता. घनश्यामदास बिर्ला महात्मा गांधीजींचे अनुयायी आणि निकटवर्ती होते. महात्मा गांधींचा दुर्दैवी अंत दिल्लीच्या बिर्लामंदिराच्या आवारातच झाला होता.

आमच्या लहानपणी घरातला कोणी मुलगा उजाडल्यानंतरही खूप वेळ अंथरुणात झोपून रहात असला तर त्याला "संस्थानिक" म्हणत असत कारण त्या काळातले संस्थानिक त्यांच्या अत्यंत ऐदीपणासाठी प्रसिद्ध होते. आणि कोणी एकादी अनावश्यक आणि महाग अशी वस्तू विकत घेतली तर तो "आता टाटाबिर्ला झाला आहे का?" असा टोमणा मारला जात असे. त्या काळात टाटाबिर्ला म्हणजे अगदी भयंकर गडगंज इसम समजले जायचे. सगळे संस्थानिक, राजे महाराजे, नवाब वगैरे लोक तर श्रीमंत असणारच, पण हे टाटाबिर्ला कुणी राजे, महाराजे किंवा नवाब नसूनसुद्धा त्यांच्यासारखे श्रीमंत मानले जात होते. 

संस्थानिकांच्या सगळ्या स्थावर आणि जंगम संपत्तीची मोजदाद करून त्यांचे आकडे प्रसिद्ध केले जात असण्याची फारशी शक्यता नव्हतीच, त्यामुळे त्यांच्यातले कोण किती श्रीमंत होते ते सामान्य जनतेला कळणे अशक्य होते. पण पब्लिक लिमिटेड कंपन्यांना दर वर्षी त्यांचे ताळेबंद प्रकाशित करावे लागतात. वर्षाच्या सुरुवातीला  त्यांची एकूण मालमत्ता किती होती आणि वर्षभरात त्यात किती वाढ किंवा घट झाली यांचे आकडे त्यात दिलेले असतात. जमीनी, इमारती, यंत्रसामुग्री वगैरेंचे अचूक मूल्यांकन दरवर्षी किंवा त्याच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या दिवसांच्या बाजारभावाने करणे व्यवहार्य नसते, पण अशा संपत्तीची कागदोपत्री नमूद केलेली मूळ किंमत आणि वर्षभरात त्यात केलेली वाढ किंवा झालेली घट यांचा हिशोब दिला जातो. त्याशिवाय त्या कंपनीने एकंदर किती कर्जे घेतलेली आहेत ते सुद्धा दिले असते. ते वजा करून त्यावरून त्या कंपनीची निव्वळ संपत्ती (Net worth) ठरवली जाते. टाटा आणि बिर्ला उद्योगसमूहाच्या कंपन्यांचे अशा प्रकारचे अहवाल उपलब्ध असल्यामुळे त्यांचेवरून त्या कंपन्या किती श्रीमंत आहेत ते समजत होते आणि अधूनमधून त्यांचे आकडे वर्तमानपत्रांमध्ये येत असत. ते सर्वसामान्य लोकांच्या आकलनापलीकडे इतके मोठे असत. मी जेंव्हा वर्तमानपत्रे वाचायला सुरुवात केली त्या काळात टाटांच्या उद्योगसमूहाची संपत्ती सर्वात जास्त होती. त्यानंतर बिर्ला उद्योगसमूह होता. म्हणून ढोबळ मानाने टाटांना सर्वात जास्त श्रीमंत समजले जात होते.

पण अशा मोठ्या कंपन्यांची संपूर्ण मालकी एक माणूस किंवा कुटुंब यांच्याकडे नसते. त्या कंपन्यांचे कोट्यावधी समभाग (शेअर्स) जगभरातील लक्षावधी लोकांनी विकत घेतलेले असतात आणि त्यातला प्रत्येक समभागधारक (शेअरहोल्डर) त्याच्याकडे असलेल्या समभागांच्या प्रमाणात त्या कंपनीचा मालक असतो. आणखी एक गंमत म्हणजे शेअरमार्केटमध्ये रोजच शेकडो किंवा हजारो शेअर्सची खरेदीविक्री होत असते, त्यामुळे या कंपन्याची मालकी रोजच्या रोज तितक्या प्रमाणात बदलत असते. पण तसे होत असले तरी ते नवे मालक कंपनीच्या रोजच्या व्यवहारात थेट हस्तक्षेप करू शकत नाहीत. वर्षभरातून एकदा किंवा अधिक वेळा सगळ्या  समभागदारांची मीटिंग घेऊन त्यात कंपनीचे निदेशक (डायरेक्टर्स) बहुमताने निवडले जातात आणि त्यांना कंपनी चालवण्याचे सर्वाधिकार दिले जातात, तसेच कंपनीच्या कामासंबंधित महत्वाचे निर्णय घेतले जातात. हे कंपनीचे संचालक लोक आपल्यातलेच किंवा आपल्या मर्जीतले असावेत, त्यांनी आपले हितसंबंध जपावेत  या दृष्टीने  कंपनीचे मूळ मालक बरेचसे समभाग आपल्याकडे ठेऊन घेतात. त्यामुळे त्यांना तितके जास्त मताधिकार मिळतात आणि बहुमताने आपल्याला हवे तसे प्रस्ताव ते पास करवून घेऊ शकतात. अशा प्रकारे ते अप्रत्यक्षपणे त्या कंपनीचे मालक समजले जातात. 

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात संपूर्ण जगातच  प्रचंड प्रमाणात आणि झपाट्याने यांत्रिकीकरण वाढत गेले. स्वातंत्र्यानंतर आधुनिक भारतालाही समृद्ध होण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मार्गाने जाण्यावाचून गत्यंतर नव्हते हे पं.नेहरूंनी ओळखले होते आणि त्यानुसार वैज्ञानिक संशोधन आणि कारखानदारी यांना प्राधान्य देण्याचे धोरण ठेवले. त्यांच्या सरकारने त्या दृष्टीने मूलभूत शास्त्रीय संशोधन करणाऱ्या  तसेच अभियांत्रिकीचे शिक्षण व प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था स्थापन केल्या, अनेक नद्यांवर बहुउद्देशीय धरणे बांधली, पायाभूत अवजड उद्योगांचे मोठे कारखाने सरकारी क्षेत्रात उभारले, अशा अनेक महत्वाच्या गोष्टी केल्या. 

पण त्यांना आणि त्यांच्यानंतर आलेल्या काही राज्यकर्त्यांना भारताचा विकास मुख्यतः  समाजवादी समाजरचनेतून व्हावा असे वाटत होते. खाजगी क्षेत्रांमधल्या कंपन्यांनीसुद्धा कुठल्या वस्तूंचे जास्तीत जास्त किती उत्पादन करावे आणि ते उत्पादन त्यांनी किती किंमतीला विकावे अशासारखे सरकारी निर्बंध त्यांच्यावर आणले. त्यामुळे कारखाने जास्त कार्यक्षमतेने चालवून किंवा अधिक आधुनिक यंत्रसामुग्री बसवून कुठल्याही वस्तूचे जास्त उत्पादन करायला वाव नव्हता किंवा तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीमधून जास्त नफा मिळवायलाही परवानगी नव्हती. मग नवीन कारखाने उभे करायचा उत्साह कुणाला वाटेल? उलट काही व्यवसायांमधल्या सगळ्या खाजगी कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करून त्या सरळ सरकारच्या ताब्यात घेतल्या गेल्या. महात्मा गांधीजींच्या चळवळीत चरख्याला फार मोठे स्थान होते. चरख्यावर सूत काढून हातमागावर विणलेले खादीचे कापड  हे महावस्त्र झाले होते. सर्व राजकीय पुढारी खादी धारण करीत असत. त्यामुळे खादीची निर्मिती आणि यासारख्या पारंपरिक ग्रामोद्योगांना सरकारकडून विशेष संरक्षण आणि उत्तेजन मिळत होते. हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाशी थोडे विसंगत होते. अशा काही कारणांमुळे त्या सरकारांच्या काळात खाजगी उद्योगक्षेत्राची वेगाने वाढ करण्यासाठी सरकारांकडून मिळायला पाहिजे होते तेवढे प्रोत्साहन मिळाले नाही. 

प्रत्येक गावांमध्ये इनामदार, जहागीरदार, जमीनदार, सावकार यांच्यासारखे थोडे सधन लोक असतात आणि इतर बहुसंख्य लोक गरीब असतात. हे ज्याचे त्याचे नशीब किंवा पूर्वजन्मीचे प्राक्तन असे समजून बहुतेक सगळे लोक शांत राहतात. सधन लोक बलवान असतात आणि काही वेळा ते गरीबांवर अन्याय करतात तेंव्हा त्यांना तो सहन करावा लागतो. पण तो असह्य झाला तर त्यातून संघर्ष सुरू होतो. रॉबिनहूडसारखे वीर तयार होऊन काही प्रमाणात त्या अन्यायाचे परिमार्जन करतात. युरोपातल्या मार्क्स नावाच्या विचारवंताने कम्युनिझम (साम्यवाद) नावाचा सगळी समाजव्यवस्था बदलून टाकायचा एक स्फोटक विचार मांडला. त्याच्या प्रभावामधून रशियामध्ये रक्तरंजित राज्यक्रांती झाली. तिथल्या गरीब जनतेने सामूहिक उठाव करून तिथल्या झार नावाच्या जुलुमी राजाला मारून टाकले आणि देशातल्या सगळ्या श्रीमंत लोकांच्या मालमत्तेची सर्रास लुटालूट केली.  

त्यानंतर कम्युनिस्ट नेत्यांनी सत्ता हातात घेतल्यानंतर मार्क्सच्या विचारांवरून असे ठरवले की त्यांच्या देशात कुणाच्याही व्यक्तिगत मालकीची काही मालमत्ताच राहणार नाही. देशातली सगळी जमीन, सगळ्या इमारती, दुकाने, कारखाने आणि सगळी स्थावर जंगम संपत्ती फक्त सरकारच्या मालकीची असेल. म्हणजे त्यानंतर देशात कुणी गरीबही राहणार नाही किंवा कुणी श्रीमंतही राहणार नाही. सगळे लोक समान राहतील. पण त्यानंतर जर कुणी मालकच नसेल तर  कुठल्या जमीनीत कुठले पीक घ्यायचे, कुठल्या वस्तूचे किती कारखाने उभारायचे, त्यात कुणी कोणते काम करायचे, कुठल्या दुकानातून कुठला माल विकायचा वगैरे सगळे कोण ठरवणार? फक्त सरकारच ते सगळे ठरवेल, सगळ्या नागरिकांनी त्यांना नेमून दिलेली कामे आपापल्या कुवतीप्रमाणे करावीत आणि त्यांना अन्न, वस्त्र, निवारा देण्याचे काम सरकारच करेल असे सांगितले गेले. पण हे सर्व लोकांच्या अनुमतीने वास्तवात आणणे अशक्य होते. कम्युनिस्ट सरकारांच्या सैन्याने बंदुकीच्या धाकाने त्याची अंमलबजावणी केली. यामुळे तिथे कम्युनिस्ट पुढाऱ्यांची दडपशाही सुरू झाली. सुरुवातीला काही वर्षे हा प्रयोग यशस्वी होत आहे आणि त्यातून त्या देशाची झपाट्याने प्रगती होत आहे असा प्रचार केला गेला. पण सर्वसामान्य जनतेवर जुलुम जबरदस्ती करून तिला अमानुषपणे  वागवले जात असल्याच्या बातम्याही बाहेर येत राहिल्या. तिथल्या दोन तीन पिढ्यांनी हे पाहिल्यानंतर त्यांचा असंतोष वाढत गेला आणि गेल्या शतकाच्या अखेरीस साम्यवादी विचारसरणीला थोडी मुरड घालून नागरिकांना स्वतःची मालमत्ता राखायचे आणि त्या मालमत्तेचा आपल्या इच्छेनुसार उपयोग करून घ्यायचे स्वातंत्र्य साम्यवादी देशांमधील जनतेलाही मिळाले.

भारतातही साम्यवादी चळवळ सुरू केली गेली होती, पण त्यात अभिप्रेत असलेला हिंसाचार करायची इथल्या सहनशील लोकांच्या मनाची तयारी होत नव्हती आणि प्रबळ इंग्रज सरकारने तसली हिंसक चळवळ निर्दयपणे चिरडून टाकली असती. त्यामुळे इथल्या अत्यंत गरीब जनतेनेही साम्यवादी चळवळीला  प्रतिसाद दिला नाही. देशातले सगळे उत्पादन आणि वितरण सरकारच्या हातात असावे, म्हणजे समाजात गरीब-श्रीमंत असे वर्ग असणार नाहीत अशा प्रकारच्या समतावादी विचारसरणीला 'डावी' आणि सगळ्या लोकांना उद्योगव्यवसाय करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असावे आणि मुख्य म्हणजे त्यात भांडवल गुंतवणाऱ्यांना त्यापासून चांगला लाभ मिळावा या भांडवलशाही विचाराला 'उजवी' विचारसरणी असे समजले जाते. भारतातल्या महात्मा गांधींच्या अनुयायांमध्ये दोन्ही प्रकारच्या विचारसरणीचे लोक होते. त्यातल्या डाव्या लोकांनी समाजवाद नावाचा अहिंसक मार्ग पत्करला. त्यांचेही उद्दिष्ट समाजातली विषमता नाहीशी करणे हेच  होते, पण त्यांना ते सनदशीर मार्गाने घडवून आणायचे होते. काँग्रेसमध्ये दोन्ही विचारसरणी मानणारे लोक होते म्हणून राज्यकर्त्यांनी सर्वसमावेशक असा मध्यममार्ग निवडला. पण तो काहीसा डावीकडे झुकणारा होता.  

श्रीमंत आणि गरीब यांची संपत्ती आणि उत्पन्न यातली तफावत कमी करण्याच्या दिशेने आर्थिक धोरण असे ठेवले गेले की व्यक्तीचे किंवा कंपनीचे उत्पन्न जसजसे वाढत जाईल, तसतसा त्याला अधिकाधिक दराने आयकर भरावा लागेल. समजा उत्पन्न दुप्पट झाले तर त्यावरील कर फक्त दुप्पट न होता तो चारपाच पट इतका वाढेल. हे दर वाढत वाढत ७०-८० टक्क्यांवर गेले. संपत्तीकर (वेल्थटॅक्स) नावाचा कर लागू करून करदात्याकडे जितकी संपत्ती असेल त्यातला काही भाग त्याने दर वर्षी कररूपाने सरकारला द्यावा असे नियम केले गेले. करदात्याची संपत्ती त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाकडे जायच्या आधी त्यातला काही भाग इस्टेट ड्यूटी म्हणून सरकारला द्यावा लागत असे. त्याने जिवंत असतांनाच आपल्या संपत्तीचा काही भाग आपल्या मुलांना दिला तर त्यावरही सरकारला गिफ्ट टॅक्स द्यावा लागत असे. लँडसीलिंग कायद्याने कमाल जमीन धारणा ठरवली गेली. कुणाकडे त्याहून जास्त जमीन असेल तर ती सरकारच्या मालकीची व्हावी असे कायदे केले गेले. अशा प्रकारे निरनिराळ्या कायद्यांखाली धनाढ्य लोकांची संपत्ती कमी करून ती सरकारकडे वळवली जायला लागल्यामुळे त्याचा एक परिणाम असा झाला की  शेती, व्यापार किंवा व्यवसाय करणारे आणि इतरही बरेचसे लोक कर वाचवण्यासाठी आपले उत्पन्न आणि संपत्ती दडवून ठेवायला लागले. ते करण्यासाठी निरनिराळे मार्ग शोधायला लागले. त्यामुळे चलनातला काळा पैसा वाढत गेला. त्याची मोजदादच होत नव्हती. आपल्याकडे किती संपत्ती आहे हे कोणी सांगायलाच तयार होत नव्हता. मग त्यांच्यातला सर्वात श्रीमंत  कोण हे कसे ठरवणार ?

देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी हैद्राबादचा निझाम मीर उस्मान अली खान ही भारतातली सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होती. त्याच्याकडे अपरंपार मालमत्ता होती. पण त्याच्या अनेक बेगमा, त्यांची मुले, त्या मुलांच्या अनेक  बेगमा आणि त्यांची मुले वगैरे सर्वांची मोठी संख्या होती. त्या सगळ्यांनाच छानछोकीने ऐषोआरामात राहण्याची सवय होती. पुढील काळात त्यांची संख्या आणखी वाढत गेली. त्या सगळ्यांनी निझामाची संपत्ती जमेल तशी वाटून घेतली, त्यातली काही संपत्ती उधळपट्टीमध्ये खर्च झाली, काही  सरकारजमा झाली, काही देशाबाहेर पाठवली गेली, काहीजण स्वतःही परदेशांमध्ये रहायला गेले  असे होत होत आजच्या अतिश्रीमंतांच्या यादीत निजामाचे वंशज दिसत नाहीत. इतर संस्थानिकांपैकी सुद्धा कोणी परदेशी जाऊन तिकडेच स्थाइक झाले आणि काही इथेच राहिले. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी सगळ्या संस्थानिकांचे तनखे बंद केले. त्यांच्या उत्पन्नाचा एक मुख्य मार्ग बंद झाला. पुढील पिढ्यांमध्ये त्यांच्या संपत्तीच्याही  वाटण्या होत गेल्या. दानधर्म, उधळपट्टी, कर आणि वाढत गेलेली महागाई यातून तिला ओहोटी लागत गेली. त्यांच्यातलाही कोणी आजच्या अतिश्रीमंतांच्या यादीत दिसत नाही.

काही संस्थानिकांनी राजकीय पक्षांमध्ये प्रवेश घेतला. बहुतेक सगळ्याच संस्थानिकांची पूर्वीची प्रजा त्यांना देव मानणारी होती. तिने या राजांना निवडणुकींमध्ये भरघोस मते देऊन निवडून दिले. त्यांना नव्या सरकारांमध्ये महत्वाची स्थाने मिळाली. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतलेल्या नेत्यांनी निवडणुकांच्या राजकारणात हिरीरीने भाग घेऊन सत्ता मिळवली. पुढल्या काळात नवे नेते उदयाला आले. नवी सत्ताकेंद्रे स्थापन झाल्यानंतर त्यांच्या आधाराने एक नवश्रीमंत वर्गही तयार होत गेला. पण या लोकांनी त्यांच्या व्यक्तिगत मालमत्तांबाबत विशेष काळजी घेतली. त्यांनी त्या मालमत्ता आपल्या स्वतःच्या नावावर न ठेवता कुटुंबामधल्या किंवा मर्जीतल्या एकनिष्ठ अशा दुसऱ्या लोकांच्या नावावर करून ठेवल्या. अनेक सहकारी संस्था आणि धर्मादाय संस्था उभारून त्यांच्या नावाने आर्थिक व्यवहार केले आणि त्या संस्थांचे संचालक किंवा विश्वस्त या नावाखाली त्या आपल्या नियंत्रणाखाली ठेवल्या. यामुळे त्यांच्यातलाही कोणी आजच्या अतिश्रीमंतांच्या अधिकृत यादीत दिसत नाही.


टाटा, वाडिया, दस्तूर, गोदरेज यासारख्या काही पारशी लोकांनी इंग्रजांच्या काळातल्या भारतात मोठ्या प्रमाणावर व्यापार आणि उद्योगव्यवसाय सुरू केले आणि त्यांना चांगले नावारूपाला आणले. अनेक मोठमोठे उद्योग चालवणारा टाटा उद्योगसमूह हा १९४७ साली भारतात अग्रगण्य होता. स्वतंत्र भारताच्या समाजवादी धोरणामधून खाजगी उद्योगधंद्यांवर काही बंधने घातली गेली होती. अशा वातावरणातही जे.आर.डी.टाटांनी टाटा उद्योगाचा ध्वज फडकत ठेवला आणि त्यात वाढ केली. नंतरही अनेक वर्षे टाटा उद्योगसमूहच अग्रगण्य मानला जात राहिला. पुढे रतन टाटा यांनी तर त्यात घसघशीत भर टाकली. आजसुद्धा टाटा उद्योगसमूहच बहुधा सर्वात जास्त श्रीमंत आहे. पण त्यांच्या संपत्तीची मालकी कोणा एका व्यक्तीकडे किंवा कुटुंबाकडे नसून ती समूहातल्या सगळ्या कंपन्यांच्या सर्व भागीदारांकडे विभागलेली आहे. 

नवा उद्योग सुरू करायच्या वेळी आधी प्रस्थापित असलेली एकादी कंपनी किंवा काही कंपन्या मिळून किंवा काही धन्नासेठ त्यात काही भांडवल गुंतवतात, त्यात बँका, एलआयसी, प्रॉव्हिडंट फंड, म्यूच्युअल फंड्स यासारख्या वित्तसंस्था भर घालतात आणि आणखी काही शेअर्सचा पब्लिक इश्यू काढून ते बाजारात विकले जातात. ते विकत घेणार्‍यांमध्ये पुन्हा व्यक्तींशिवाय अनेक संस्था, कंपन्या, ट्रस्ट, फंड असतात. हे सगळे त्या कंपनीचे शेअर होल्डर किंवा मालक असतात. मोठ्या उद्योगसमूहातल्या  कंपन्यांनी एकमेकांमध्ये भांडवल गुंतवलेले असते. काही प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या, धर्मादाय संस्था (ट्रस्ट्स) यांनी कंपन्यांचे शेअर्स घेतलेले असतात. अशा गुंतागुंतीच्या व्यवहारामध्ये कुठल्याही कंपनीमध्ये कुणा व्यक्तीची नेमकी किती भागीदारी असेल हे सांगणे कठीण असते. टाटा उद्योगसमूहाने कित्येक पिढ्या पाहिल्या असल्याने ते जास्तच जटिल होत गेले असणार. श्री.रतन टाटा हे त्या समूहाचे अध्वर्यू भारतातले सर्वश्रेष्ठ कारखानदार समजले जात होते, पण सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचे नाव येत नव्हते. त्यांच्या व्यक्तिगत नावावर बहुधा फार जास्त शेअर्स नसावेत.


स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतातला चित्रपट उद्योग खूप भरभराटीला आला. हिंदी तसेच दक्षिणेतल्या चित्रपटांमधले नायक नायिका एकेका सिनेमासाठी कोट्यवधि रुपये मिळवायला लागले. त्यांचे आलीशान बंगले, गाड्या, त्यांनी दिलेल्या पार्ट्या वगैरेंची रसभरित वर्णने फिल्मी मासिकांमध्ये वाचून कुणालाही असे वाटेल की नेहमी झगमगाटात राहणारे ते लोकच सर्वाधिक श्रीमंत असणार. नटनट्याच जर इतके श्रीमंत असतील तर अशा अनेक नटनट्यांना ते मागतील तेवढे पैसे देणारे चित्रपटनिर्माते किती श्रीमंत असतील?  पण त्या लोकांची नावेही देशामधील सर्वाधिक श्रीमंतांमध्ये येत नाहीत.

मी लहानपणापासून सगळ्यात जास्त श्रीमंत या अर्थाने 'टाटाबिर्ला' अशा जोडीचे नाव ऐकत आलो होतो. इंग्रजांच्या काळात जसे काही पारशी उद्योगपती पुढे आले होते तसेच काही मारवाडी उद्योगपतीही तयार झाले होते. त्यांच्यामध्ये बिर्ला कुटुंब आघाडीवर होते. त्या काळातल्या बिर्लांनी व्यापारामधून गडगंज कमाई केली आणि त्यातून व्यापाराच्या जोडीला कारखानदारी आणि इतर व्यवसाय सुरू केले. त्यात ज्यूट आणि कापडाच्या गिरण्या, सिमेंटचे, साखरेचे आणि कागदाचे कारखाने, हिंदुस्थान टाइम्स हे वर्तमानपत्र वगैरे व्यवसाय येतात.  श्री.घनश्यामदास बिर्ला हे महात्मा गांधींचे अनुयायी होते आणि त्यांनी स्वराज्याच्या चळवळीलाही मदत केली होती. काँग्रेसमधल्या नेत्यांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते. स्वतंत्र भारतात केंद्रात तसेच सगळ्या प्रांतांमध्येही काँग्रेसची सरकारे होती. त्या काळात बिर्ला उद्योगाचीही वेगाने भरभराट होत गेली  त्यामुळे बिर्लांचे नावही टाटांच्या सोबत घेतले जात राहिले होते.  


ज्याप्रमाणे टाटांच्या नावाने काही प्रसिद्ध संशोधन संस्था आणि हॉस्पिटले आहेत तशीच अनेक धर्मादाय कामे बिर्लांनीही केली आहेत. त्यांच्या राजस्थानमधल्या पिलानी या गावी उभारलेली बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (बिट्स पिलानी) प्रसिद्ध आहे, देशभरातल्या अनेक शहरांमध्ये भव्य आणि सुंदर अशी बिर्ला मंदिरे बांधली आहेत, पुण्यात आदित्य बिर्ला हॉस्पिटल आहे वगैरे. पुढील काळात बिर्ला कुटुंबात वाटण्या झाल्या आणि वेगवेगळे ग्रुप झाले, पण त्यातल्या आदित्य बिर्ला ग्रुपने आपली यशस्वी वाटचाल पुढे चालू ठेवली. बिर्लांच्या कंपन्यांचेही लक्षावधी समभागधारक असले तरी त्यांनी नियंत्रक समभाग (कंट्रोलिंग शेअर्स) आपल्या नावावर ठेवले आहेत. गुगलच्या आधी माहिती मिळवण्याची साधने कमी होती. काही वर्तमानपत्रे माहिती गोळा करून कोण सर्वात श्रीमंत आहे त्याची बातमी कधी कधी देत असत. त्यात काही वेळा बिर्लांचे नाव घेतले जात असे. आजही श्री.कुमारमंगलम बिर्ला यांचे नाव पहिल्या दहा सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये आहे. 

स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वालचंदनगर आणि किर्लोस्करवाडी या दोन उद्योगनगरी उभ्या राहिल्या होत्या. त्या अनुक्रमे शेठ वालचंद हिराचंद आणि श्री.शंतनुराव किर्लोस्कर यांच्या होत्या. वालचंद ग्रुपकडे याशिवाय प्रीमियर ऑटोमोबाइल्स हा मोटारींचा कारखाना, कूपर मशीन टूल्स, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन ही बांधकाम व्यवसायातली प्रमुख कंपनी असे अनेक उद्योग होते आणि किर्लोस्करांकडे किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, कमिन्स, किर्लोस्कर इलेक्ट्रिक आदि मोठे कारखाने होते. त्यांच्या वंशजांनी हे उद्योगधंदे पुढे चालवत ठेऊन त्यात वाढही केली असली तरी श्रीमंतीच्या शर्यतीत ते थोडे मागे पडलेले दिसतात. त्यांची नावे आजच्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये दिसत नाहीत.


स्वातंत्र्यानंतरच्या काळात धीरूभाई अंबानी नावाच्या एका विलक्षण धडाडी असलेल्या कल्पक माणसाने औद्योगिक क्षेत्रात चमत्कार घडवून आणला. त्याने एक कापडांचा व्यापारी म्हणून सुरुवात केली आणि  जेंव्हा देशात लायसेन्सपरमिट राज्य चालले होते त्या काळात राजकारणी आणि नोकरशहा यांच्याशी संगनमत करून अनेक लायसेन्से आणि परमिटे मिळवली. रिलायन्स नावाची भरपूर फायदा देणारी कंपनी काढली. जेंव्हा शेअर्स विकत घेणे हे फक्त श्रीमंतांचे आणि जुगारी वृत्तीच्या सट्टेबाजांचे काम समजले जात होते त्या काळात मध्यमवर्गीय लोकांना शेअर्समध्ये गुंतवणूक करायला प्रवृत्त करून शेअरबाजाराचे रूपच बदलून टाकले. सर्वसामान्य लोकांना निरनिराळी प्रलोभने दाखवत त्यांच्याकडून अधिकाधिक पैसे गोळा करून त्यातून निरनिराळे मोठमोठे कारखाने उभे केले आणि त्यातून मिळालेल्या नफ्याचा काही भाग लाभांशामधून वाटून टाकून लोकांचा विश्वास संपादन केला. त्यांनी रिलायन्समध्ये केलेली गुंतवणूक बुडाली नाही, तिचे मूल्य वाढतच गेले.  पुढे आर्थिक धोरण बदलून मुक्त अर्थव्यवस्था सुरू झाल्यानंतर तर रिलायन्सला पंख फुटले आणि तो जागतिक पातळीवरील उद्योग झाला, त्याची गणना जगातील उद्योगांमध्ये आणि अंबानींची गणना जगातील अब्जाधीशांमध्ये व्हायला लागली.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाचा विकास होण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रात मोठमोठ्या संशोधनसंस्था, प्रयोगशाळा स्थापन केल्या गेल्या, धरणे बांधली गेली, वीजकेंद्रे उभारली गेली, तसेच अवजड उद्योगांचे जंगी कारखाने सुरू करण्यात आले. या सर्वांनी भरपूर नफा कमावून सरकारच्या तिजोरीत भर घालावी अशी अपेक्षा ठेवली गेली नव्हती. जनतेच्या उपयोगाचे पदार्थ आणि वस्तू आपल्याच देशात तयार केल्या जाव्यात आणि त्या जनतेला रास्त भावात मिळाव्यात एवढ्या उद्देशाने ही गुंतवणूक करण्यात येत होती आणि तिचा चांगला उपयोग होतांना दिसत होता. शिवाय प्रत्येक संस्थेत किंवा कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधली गेली, त्यांच्या कुटुंबियांसाठी दवाखाने, शाळा, क्रीडांगणे, बागबगीचे वगैरे सोयी करून ठिकठिकाणी काही आदर्श वसाहती तयार केल्या गेल्या. समाजासाठी या सगळ्या चांगल्याच गोष्टी होत्या.

ही सगळी सरकारच्या मालकीची संपत्ती होती म्हणून त्यांचे व्यवस्थापन करण्याचे काम प्रशासनातले अधिकारी किंवा राजकीय पुढारी अशा या बाबतीत अननुभवी लोकांना दिले जात होते. ते लोक एकाद्या जागी दोन तीन वर्षे राहून दुसरी चांगली पोस्ट मिळाली की तिकडे निघून जात. त्यांना त्या क्षेत्रांमधले ज्ञान नसायचे आणि त्यामध्ये जास्त रसही नसायचा. त्या व्यवसायासाठी लागणारी खरेदीविक्री करायचे कौशल्य त्यांच्याकडे नव्हते. बदलत्या जगात कुठल्या नवनव्या प्रक्रिया उपलब्ध होत आहेत, कुठल्या वस्तूंची किती गरज पडणार आहे हे ओळखून त्यांच्यासाठी नियोजन करण्याची दूरदृष्टी त्यांच्याकडे नव्हती. त्यांनी तिथेही आपली सरकारी कचेऱ्यांमधली दीर्घसूत्री लालफीताशाही आणली. अशा कारणांमुळे या क्षेत्रामधील कार्यक्षमता कमी होत गेली. सार्वजनिक क्षेत्रातले बहुतेक उद्योग तोट्यात जायला लागले, ते पांढरे हत्ती बनले. त्यांना कसेबसे चालू ठेवण्यासाठी सरकारच्या तिजोरीमधून खर्च करायची गरज पडायला लागली आणि तिच्यावरचा ताण वाढत गेला. त्यांचेपासून समाजाचा फायदा होण्याऐवजी समाजावरच त्यांचा भार पडत आहे याविरुद्ध आक्रोश सुरू झाला. तीन चार दशकांच्या अनुभवानंतर समाजवादी विचारसरणीची ही दुसरी बाजू दिसायला लागली.

त्या काळात खाजगी उद्योगांवर काही कडक सरकारी बंधने घातली गेली होती. प्रत्येक कारखान्याने कुठल्या वस्तूंचे किती उत्पादन करावे आणि ते किती किंमतीला विकावे हे सगळे सरकार ठरवत असे आणि उद्योजकांना ते पाळावे लागत असे. पण अर्थशास्त्रातल्या नियमांनुसार बाजारातले भाव मागणी आणि पुरवठा यावरून ठरत असतात. काही वस्तूंसाठी ग्राहकांकडून जास्त मागणी होत असेल आणि कारखानदार / विक्रेत्यांकडून तितका पुरवठा होत नसेल तर काही ग्राहक त्या वस्तूसाठी जास्त किंमत द्यायला तयार होतात आणि त्या वस्तूंचा भाव वाढतो. ते ग्राहक अशा वाढलेल्या भावाने त्या वस्तू विकत घेतात पण उरलेल्या ग्राहकांना त्या वस्तू मिळत नाहीत. अशा वेळी चांगला भाव मिळत आहे म्हणून जास्त वस्तूंचे उत्पादन होऊन त्या बाजारात येतात, तसेच तितका वाढीव भाव द्यायला तयार नसलेले ग्राहक कमी झालेले असतात. यामुळे मागणी आणि पुरवठा यांच्यातली तफावत कमी होते. याच्या उलट काही वस्तूंचा जास्त पुरवठा होत असेल आणि तितक्या सगळ्या वस्तू घेणारे ग्राहक नसतील तर त्या सगळ्या वस्तू विकल्या जात नाहीत, काही वस्तू ग्राहकांची वाट पहात पडून राहतात. अशा वेळी काही विक्रेते भाव कमी करतात आणि त्या कमी केलेल्या किंमतीत ग्राहक त्या वस्तू जास्त प्रमाणात विकत घेतात. त्यानंतर त्या वस्तूंचे नवे उत्पादन कमी केले जाते. अशा रीतीने मागणी आणि पुरवठा यांच्यामधला समतोल साधला जातो. या गोष्टी सतत बदलत राहतात. त्यात एक डायनॅमिक समतोल असतो.

पण सरकारी बंधनांमुळे विक्रेत्याला भाव वाढवण्याची परवानगी नसेल आणि जास्त उत्पादन करून पुरवठा वाढवायलाही परवानगी नसेल तर त्या वस्तूची तीव्र टंचाई निर्माण होते, काही व्यापारी त्याचा फायदा घेऊन त्यांचा काळाबाजार करतात. या प्रकारच्या खरेदीविक्रीचे व्यवहार अनधिकृत असतात. त्यामधून मिळवलेल्या पैशांची कुठे नोंद केली जात नाही. असा पैसा काळा किंवा दोन नंबरचा म्हंटला जातो. इतर काही मार्गांनीसुद्धा काळा पैसा तयार होत असतो. काही व्यावसायिकांकडून आयकर वाचवण्यासाठी  कमी उत्पन्न दाखवले जाते, विक्रीकर वाचवण्यासाठी विदाउट रिसीट माल विकला जातो. जुगारी लोक मटक्यावर किंवा रेसमधल्या घोड्यांवर पैसे लावतात, क्रिकेटच्या सामन्यात कोणता संघ जिंकेल यावरही बेटिंग केले जाते आणि त्यासाठी मॅचफिक्सिंग केले जाते. गरीबांच्या भल्यासाठी रेंटअॅक्ट करून घरांची भाडी अत्यंत कमी दरावर कायमसाठी गोठवण्यात आली. पण त्यामुळे ज्यांना शक्य होते अशा पैसेवाल्या लोकांनी चाळी बांधून गरीब लोकांना खोल्या भाड्याने देणे सोडून दिले. गरीब लोकांना ते शक्य नव्हतेच. मोठ्या शहरांमध्ये भाड्याने घर मिळणे अशक्यप्राय झाले आणि अवाच्यासवा पागडी देण्याची पद्धत सुरू झाली. प्रचंड प्रमाणात अवैध झोपडपट्ट्या तयार होत गेल्या. नवे घर बांधतांना किंवा विकत घेतांना त्याच्या किंमतीचा काही भाग सर्रास दोन नंबरने मागितला जात असे. सिनेमा उद्योगातले अनेक व्यवहार  असेच गुपचुपपणे होत असतात असे सांगितले जाते. गुन्हेगारी जगात  चोरी, दरोडे, लूटमार, अपहरण यासारखे प्रकार आहेतच. लाचलुचपत, भ्रष्टाचार वगैरे मार्गांनी मिळवलेल्या कमाईचा कुठे हिशोब ठेवला जात नाही. अशा प्रकारांनी दोन नंबरचा किंवा काळा पैसा इतक्या जास्त प्रमाणात वाढत गेला की त्याची एक वेगळी समांतर अर्थव्यवस्था सुरू झाली. त्यात धनाढ्य झालेल्या व्यक्तींची नावे कुठेही सांगितली जाऊ शकत नाहीत. मग त्यातला सर्वाधिक श्रीमंत कोण हे कसे समजणार?

तीन चार दशके साचेबंद समाजवादाच्या मार्गाने वाटचाल करतांना त्याचे हे काही परिणाम दिसायला लागल्यावर सरकारच्या आर्थिक धोरणामध्ये काही बदल होऊन हळूहळू ते उदारमतवादी होत गेले, डाव्या बाजूकडून उजवीकडे सरकायला लागले. खाजगी  क्षेत्रामधल्या उद्योगव्यवसायांवरील काही बंधने शिथिल झाली. उद्योजकांना उत्पादन आणि विक्री यांच्या बाबतीत जास्त स्वातंत्र्य मिळत गेले. उद्योगधंद्यांमधून नवी संपत्ती निर्माण करून तिचा संचय करता येणे शक्य झाले. त्यामधून त्यांना नवनवीन उद्योगव्यवसाय सुरू करायला उत्तेजन मिळायला लागले. परदेशातल्या कंपन्यांनाही काही प्रमाणात भारतात कारखाने काढायला परवानगी मिळाल्यामुळे त्याला अधिक वेग आला.

विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील प्रगतीमधून जगासरतल्याच सगळ्या लोकांचे जीवन बदलत गेले. सुती आणि लोकरी कपड्यांबरोबर रेयॉन, नायलॉन, पॉलिएस्टर यासारख्या कृत्रिम धाग्यांची वस्त्रे आली आणि ती अधिकाधिक प्रमाणात लोकप्रिय होत गेली. निरनिराळ्या प्रकारच्या प्लॅस्टिक आणि कृत्रिम रबराच्या अनंत वस्तू तयार व्हायला लागल्या आणि लोकांच्या उपयोगात आल्या. स्वयंपाकघरात अॅल्युमिनियम आणि स्टेनलेस स्टीलची भांडी आणि मिक्सर ग्राइंडर, ओव्हन, रेफ्रिजरेटर आले. रस्त्यावर स्कूटर्स, मोटरसायकल्स, कार्स, ट्रक्स वगैरे वाहनांची संख्या अनेकपटीने वाढत गेली. अनेक प्रकारची नवी औषधे आणि सौंदर्यप्रसाधने  निघाली. इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात तर विस्मयकारक बदल होत गेले. रेडिओ, टी.व्ही., टेपरेकॉर्डर, टेलीफोन या सगळ्यांची अधिकाधिक उपयुक्त आणि आकर्षक अशी नवनवी मॉडेल्स भराभर येत गेली. या सगळ्या वस्तू भारतात बनवण्यासाठी अनेक नवे कारखाने उभारले गेले त्यातले बहुतेक सगळे खाजगी क्षेत्रामध्येच उभारले गेले. त्यासाठी पहिल्यापासून अस्तित्वात असलेल्या कंपन्यांनीही आपापल्या क्षमता वाढवल्या आणि अनेक नव्या कंपन्याही सुरू होत गेल्या. त्यांनी भांडवल उभे करण्यासाठी अधिकाधिक शेअर्स विकायला काढले. 

त्यामुळे शेअरबाजारातल्या उलाढाली अनेक पटीने वाढत गेल्या. कमी किंमतीत शेअर्स विकत घ्यायचे आणि त्यांचे भाव वाढवून ते जास्त किंमतीला विकायचे असा झटपट श्रीमंत होण्याचा एक नवा मार्ग त्यामधून निघाला. हर्षद मेहता नावाच्या माणसाने अल्पावधीत अशा प्रकारे कोट्यावधी रुपये कमावले होते. पण त्याने केलेले गैर प्रकार उघडकीला आल्यामुळे तो स्वतः गोत्यात आला आणि शेअर बाजारही कोसळला. त्यानंतर असे प्रकार पुन्हा पुन्हा होऊ नयेत अशी काळजी सरकारतर्फे घेण्यात आली आणि शेअरबाजार सुरळित मार्गावर आला. तेंव्हपासून त्याची घोडदौड आजतागायत सुरू आहे आणि त्यामुळेही अनेक लोकांची संपत्ती वाढत गेली आहे, अनेकांनी श्रीमंतीची शिखरे गाठली आहेत. 

गेल्या शतकाच्या अखेरीला आलेल्या संगणक क्रांतीने जगभरातली परिस्थिती आश्चर्यकारक गतीने झपाट्याने बदलत गेली. संगणकांमुळे कारखाने, बँका, सरकारी ऑफिसे, व्यापार, पर्यटन, उद्योगव्यवसाय या सगळ्या क्षेत्रांमधले सगळे व्यवहार कमालीच्या वेगाने आणि अचूकतेने व्हायला लागले आणि त्यांची कल्पनातीत गतीने वाढ होत गेली. त्याच्या पाठोपाठ आलेल्या इंटरनेटने सगळे जग जवळ आणले. कुठेही न जाता हवी ती माहिती सहज मिळायला लागली. माहिती तंत्रज्ञान ही एक विज्ञान तंत्रज्ञानाची नवी शाखाच उदयाला आली.  त्याच्या बरोबरच संदेशवहनात क्रांतिकारक  प्रगती होत गेली. चित्र, शब्द आणि आवाज या तीन्ही प्रकारचे संदेश जगभरात कुठूनही कुठेही क्षणार्धात पाठवणे शक्य होऊ लागले. सेलफोन आल्यावर तर आपल्या खिशात ठेवता येईल इतक्या लहानशा उपकरणाने ते सगळे सहजपणे करता येऊ लागले आणि मुख्य म्हणजे हे सगळे अगदी सामान्य माणसाला परवडू शकेल इतक्या कमी खर्चामध्ये किंवा जवळ जवळ फुकट करता येऊ लागले. मोबाइल फोनमधून पैसे देता आणि घेता येऊ लागले, त्यामुळे रोख रकम जवळ बाळगायची आवश्यकता कमी होत गेली.

हे सगळे साध्य करण्यासाठी काँप्यूटर आणि कम्युनिकेशन या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक नव्या कंपन्या जगभर सगळीकडे सुरू झाल्या आणि त्यातल्या मायक्रोसॉफ्ट, अॅपल, गूगल यासारख्या कंपन्या तर सगळ्या जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्या झाल्या. भारतात सुद्धा या क्षेत्रात काम करणाऱ्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, टेकमहिंद्रा यासारख्या कंपन्या सुरू झाल्या आणि बघताबघता मोठ्या होत गेल्या, तसेच अनेक परदेशी कंपन्यांच्या शाखा भारतात उघडल्या गेल्या. बंगळूरू, पुणे, हैद्राबाद यासारख्या शहरांमध्ये खास आयटी पार्क उघडले गेले. या क्षेत्राने युवकांना नोकऱ्यांच्या भरपूर संधी दिल्या. त्यातले लक्षावधी युवक अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियाला जाऊन येत असतात. कित्येक लोक तिथे जाऊन राहिले. लक्षावधी युवक भारतातच राहून परदेशातली कामे करत आहेत.  या क्षेत्रात इतर क्षेत्रांच्या मानाने जास्त चांगले पगार मिळायला लागले. त्यात काम करणाऱ्या लोकांचे राहणीमान सुधारले, त्यांची क्रयशक्ती वाढली, त्यातून ठिकठिकाणी मोठमोठे मॉल्स उभे राहिले. सगळ्या मोठ्या शहरांमध्ये गगनचुंबी इमारती बांधल्या गेल्या आणि त्यात वाढ होतच आहे. चार चाकी वाहनांची गर्दी होऊन रस्ते अपुरे पडायला लागले आहेत. वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी अनेक उड्डाणपूल बांधले जात आहेत. महानगरांना जोडणारे प्रशस्त महामार्ग बांधले गेले, आणखी बांधले जात आहेत. अशा सगळ्या प्रकारे देश समृद्ध होत आहे आणि त्यात अब्जाधीश लोकांची संख्याही वाढत आहे.

पूर्वीच्या काळी गावात ज्या लोकांचे मोठे वाडे असत, आजूबाजूला अनेक शेते असत, गोठ्यात खूप गुरेढोरे असत, घरातली सगळी कामे करायला अनेक गडीमाणसे असत, हाताशी अनेक हुजरे असत आणि जे लोक समारंभांमध्ये उंची वस्त्रे आणि दागदागिने घालून तोऱ्यात मिरवत असत असे लोक गावातले श्रीमंत समजले जात असत. त्या लोकांच्या खापरपणजोबांनी लढायांमध्ये दाखवलेल्या शौर्यासाठी त्यांना मिळालेल्या जहागिरी पुढच्या पिढ्या काडीचेही कष्ट न करता मनसोक्त उपभोगत असत. मुंबईसारख्या शहरातले अतिश्रीमंत लोक मलबारहिलवरील बंगल्यात रहात,  रोल्सरॉइससारख्या महागड्या इंपोर्टेड गाड्यांमध्ये फिरत, पंचतारांकित हॉटेलांमध्ये पार्ट्या करत आणि अधून मधून मौजमजा करण्यासाठी परदेशी जात असत. सामान्य लोकांच्या मनात श्रीमंतांविषयी अशा प्रकारच्या ढोबळ धारणा असायच्या. त्यांच्यातला प्रत्यक्षात कोण किती जास्त श्रीमंत आहे हे कसे ठरवणार? 

सरकारने संपत्ती कर लावायला सुरू केल्यानंतर दर वर्षी सर्वात जास्त प्रॉपर्टी टॅक्स कुणी भरला याचे आकडे कधी तरी वर्तमानपत्रांमध्ये येत असतील. पण मला ते फार वेळा वाचल्याचे आठवत नाही आणि त्यातली नावेही लक्षात राहिली नाहीत. किंबहुना कोण कोण किती श्रीमंत आहेत हे समजून घेण्यातच मला काही इंटरेस्ट असायचे कारण नव्हते. त्यांचे जग वेगळे आणि आपले जग वेगळे, त्यांच्याशी आपला कधीच काही संबंध येणे अशक्य आहे. मग कशाला त्यांची चौकशी करायची? असे मला वाटत असे. त्यामुळे कोणत्या काळात कोण सर्वाधिक श्रीमंत होते याची मला काही सुसंगत अशी माहिती मिळाली नाही किंवा ती जमवावी असेही मला कधी वाटले नाही.

गेल्या शतकाच्या अखेरीला अमेरिकेतल्या फोर्ब्स नावाच्या मॅगेझिनने जगभरातल्या अब्जाधीशांची यादी प्रसिद्ध करायला सुरुवात केली. ही यादी ऑथेंटिक समजली जाते. काही वर्षांनंतर काही भारतीय नावे त्या जागतिक यादीत यायला लागली. भारतातल्या अब्जाधीशांच्या वेगळ्या याद्याही प्रसिद्ध व्हायला लागल्या. या याद्यांमधल्या  कुणाकडे किती संपत्ती आहे हे ठरवतांना त्यांच्या मालकीचे कुठल्या कंपनीचे किती शेअर्स आहेत आणि त्या शेअर्सचा बाजारभाव किती आहे हे ठरवून त्याप्रमाणे त्यांचे मूल्य काढले जाते. शेअर बाजारात रोजच उलाढाल चाललेली असते आणि शेअर्सचे भावही वरखाली होत असतात. त्यामुळे या यादीमधील अब्जाधीशांची संपत्तीसुद्धा रोज कमीजास्त होतच असणार.

मला असेही वाटते की अशा प्रकारचे संपत्तीचे आकडे आभासी असतात. एकाद्या माणसाकडे त्याच्या कंपनीचे प्रत्येकी दहा रुपयांचे दहा लाख शेअर्स असतील, तर त्यांचे मूल्य (फेसव्हॅल्यू) एक कोटी रुपये होईल, पण शेअरबाजारात त्या शेअरचा भाव हजार रुपये असला तर त्याची संपत्ती एक अब्ज रुपये समजली जाईल. तो अब्जाधीश आहे असे मानले जाईल. पण त्याच्याकडे प्रत्यक्षात इतके पैसे नसतातच. तेवढे पैसे जमवण्यासाठी त्याने आपल्याकडचे सगळे शेअर्स विकायला काढले तर त्यांचा बाजारभाव धाडकन खाली कोसळेल आणि त्याची आभासी संपत्ती एकदम कमी होऊन जाईल. मग अशा आकड्यांना काय अर्थ आहे? तरीही दुसरी कुठलीच अधिकृत माहिती उपलब्ध नसल्यामुळे मी फोर्ब्स कंपनीच्या आकड्यांचाच आधार घेऊन कोण सर्वात श्रीमंत आहे हे पहायचा प्रयत्न केला आहे.


फोर्ब्स कंपनीने दाखवलेले १९९६ पासून पुढील वर्षांमधील भारतीय अब्जाधीशांचे आकडे गूगलवर मिळाले. या आकड्यांनुसार १९९६चे सर्वात श्रीमंत कुमार मंगलम बिर्ला यांच्याकडे त्या वर्षी दोनअब्ज डॉलर एवढी आणि दुसऱ्या क्रमांकावरील लक्ष्मी मित्तल यांच्याकडे दीड अब्ज डॉलर एवढी संपत्ती होती. या दोघांचीही संपत्ती वाढून आता अनुक्रमे पंचवीस आणि सोळा अब्ज डॉलर इतकी झाली आहे, पण क्रमवारीत ते आता अनुक्रमे आठव्या आणि पंधराव्या स्थानावर आहेत. नंतरच्या काळात काही वर्षे अझीम प्रेमजी, लक्ष्मी मित्तल आणि दिलीप शंघवी पहिल्या दोन नंबरांमध्ये होते, पण  गेल्या पंचवीस वर्षांमध्ये आधी धीरूभाई अंबानी आणि त्यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी सातत्याने पहिल्या दोन क्रमांकांमध्ये येत आहेत. 


२०१७ नंतर फक्त मुकेश अंबानी आणि गौतम अडानी हे दोघेच पहिल्या दोन स्थानांमध्ये दिसतात आणि या दोघांचीही संपत्ती कमीजास्त होत असली तरी सुमारे शंभर अब्ज डॉलर्सच्या आसपास असते. अझीम प्रेमजी, लक्ष्मी मित्तल आणि दिलीप शंघवी या तीघांच्याही संपत्तीमध्येही वाढ झाली आहेच आणि हे तीघेही पहिल्या वीसांमध्ये येतातच. त्यांच्याशिवाय शिव नाडार, सावित्री जिंदाल, राधाकृष्ण दामाणी, सुनील मित्तल, सायरस पूनावाला,  उदय कोटक, मंगलप्रभात लोढा वगैरे लोकांनी पहिल्या वीसांमध्ये स्थान मिळवले आहे. गोदरेज, बजाज, हिंदुजा वगैरे धनाढ्य कुटुंबे आहेतच. टाटांशी संबंधित असलेले शापूरजी मिस्त्री आहेत. 

यातील प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या एका किंवा अनेक उद्योगव्यवसायांशी निगडित आहेत. त्यांच्या कंपन्या माहिती तंत्रज्ञान, पेट्रोलियम, औषधे, रसायने, सिमेंट, स्टील, इमारतबांधणी, बँकिंग, रिटेल विक्री, वाहतूक, पर्यटन यांच्यासारखे उद्योग आणि सेवा पुरवण्यात  आघाडीवर आहेत. यांच्याशिवाय ज्यांची नावे मी कधी ऐकली नव्हती असे आणखी काही लोक आहेत. पण कुठलाही प्रसिद्ध नेता किंवा अभिनेता यांची नावे या यादीत दिसत नाहीत. या वर्षातल्या शंभराव्या क्रमांकावरील अब्जाधीशाची संपत्ती सुमारे तीन अब्ज डॉलर्सएवठी म्हणजे १९९६मधल्या सर्वात श्रीमंत माणसापेक्षाही जास्त आहे. या यादीतली बहुतेक नावे गुजराथी, मारवाडी, पारशी, सिंधी, पंजाबी अशा लोकांची आहेत. काही थोडे दाक्षिणात्यही आहेत, पण पहिल्या शंभर नावांमध्ये एकही मराठी नाव दिसत नाही. त्या यादीत महाराष्ट्रातले अनेक उद्योगपती आहेत, पण नावांवरून ते मराठीभाषिक वाटत नाहीत.

(समाप्त)


Wednesday, September 25, 2024

वॉशिंग्टन डी सी ची सहल

 मी २००८ मध्ये दिलेल्या माझ्या अमेरिकेच्या पहिल्या भेटीत मी वॉशिंग्टन डीसी या तिथल्या राजधानीला जाऊन आलो होतो. पण आता न्यूजर्सीमध्ये रहात असलेला माझा मुलगा आणि त्याच्या कुटुंबियांनी अजून हे प्रेक्षणीय स्थळ पाहिले नव्हते.  एका रविवारी हवामान चांगले होते हे पाहून आम्ही एकदम वॉशिंग्टन डीसीला धावती भेट द्यायचे ठरवले. कारने जायचे असल्यास चार तासांचा रस्ता होता हे पाहिले आणि सकाळी उठून तयार होऊन बाहेर पडलो. रस्त्यावर नेहमीसारखाच बऱ्यापैकी ट्रॅफिक होता, तसेच ठिकठिकाणी टोलनाकेही होते. वाटेत एका फूडमॉलवर थांबून थोडे खाऊन पिऊन घेतले आणि दुपारी बारा वाजायच्या सुमाराला वॉशिंग्टन डीसीच्या आसमंतात जाऊन पोचलो. तिथला उंच मनोरा दुरूनच दिसायला लागला.


मागच्या वेळेला मी एका टूरिस्ट कंपनीबरोबर गेलो होतो, त्यामुळे तिथे गेल्यावर कुठकुठल्या जागा कुठल्या क्रमाने पहायच्या ते सगळे आमच्या गाइडनेच ठरवलेले होते. आमच्यासारखे पर्यटक फक्त बसमधून उतरायचे, ते ठिकाण बघायचे आणि पुन्हा बसमध्ये चढायचे एवढेच करत होते. मी त्या वेळचा सगळा सविस्तर वृत्तांत ब्लॉगवर लिहून ठेवला होता पण आमचे या वेळचे येणे इतके अचानक ठरले होते की ते लेख शोधून काढून वाचायलाही फुरसत मिळाली नाही. शिवाय पंधरा वर्षांमध्ये कितीतरी गोष्टी बदलल्या असण्याची शक्यताही होतीच. म्हणून मी या वेळी सगळे काही नव्याने पहायचे असेच ठरवले.

मला एवढे आठवत होते की तिथे मधोमध वॉशिंग्टन मेमोरियलचा उंचच उंच स्तंभ आहे आणि त्याच्या चार दिशांना दूर अंतरावर  कॅपिटाल बिल्डिंग, लिंकन मेमोरियल, जेफरसन मेमोरियल आणि व्हाइट हाउस या चार मुख्य प्रसिद्ध आणि प्रेक्षणीय इमारती आहेत.  त्या चारी इमारतींना बाहेरच्या बाजूने जोडणारा रिंग रोड तेंव्हा तरी नव्हता. त्या भागात काही विस्तीर्ण तलाव होते आणि पोटॅमिक नावाची एक नदीही होती. आम्ही त्यांना वळसे घालत वेग वेगळ्या रस्त्यांनी जाऊन या चार इमारती पाहिल्या  होत्या. मध्यंतरीच्या काळात त्यात आणखी काही बदलही झाले असतील. नवे फ्लायओव्हर्स किंवा अंडरपास बांधले गेले असतील. त्यामुळे मी पूर्वीच्या अनुभवावरून काही मार्गदर्शन करणे योग्य नव्हतेच. पण आता सोबत जीपीएस असल्यामुळे आम्हाला रस्ते लक्षात ठेवायची काही आवश्यकताही नव्हती.

 आम्ही लिंकन मेमोरियलपासून सुरुवात करायचे ठरवले आणि जीपीएसला तशी आज्ञा केली. जीपीसने आज्ञाधारकपणे आम्हाला लिंकन स्मारकापर्यंत आणले. पण तिथे आसपास कुठेही मोटार उभी करायला जागाच दिसत नव्हती, अधिकृत असा पार्किंग लॉटही दिसत नव्हता.  तिथले मुख्य रस्ते सोडून लहान लहान रस्त्यांवरून फिरून पाहिले तर जिकडे तिकडे गाड्याच गाड्या पार्क करून ठेवलेल्या होत्या. पंधरा वीस मिनिटे उलटसुलट दिशांनी फिरल्यावर एक लहानशी मोकळी जागा दिसली. दुसऱ्या कुणी ती पटकवायच्या आधी आम्ही आमची मोटार तिथे उभी केली आणि बाहेर पडलो. 


तिथून लिंकन मेमोरियलची भव्य इमारत दिसतच होती. त्या दिशेने चालत चालत तिथपर्यंत गेलो आणि पंचवीस तीस पायऱ्या चढून वर गेलो. ग्रीक डोरिक टेंपलच्या धर्तीवर बांधलेल्या या इमारतीला ३६ खांब आहेत आणि त्यांच्या आधाराने सपाट आकाराचे छप्पर आहे. वेगवेगळ्या अमेरिकन संस्थानांची नांवे यातील प्रत्येक खांबावर खोदलेली आहेत आणि उरलेली नांवे वेगळ्याने एका फलकावर दिली आहेत. समोरची बाजू पूर्णपणे मोकळीच आहे. ही संपूर्ण इमारत पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडांपासून बांधलेली आहे.


पायऱ्या चढून इमारतीत गेल्यानंतर समोर अब्राहम लिंकन यांचा भव्य पुतळा आहे. तसा तो अगदी दूरवरून दिसतच असतो. जवळ जाता जाता त्याची भव्यता आणि लिंकनच्या मुद्रेवरील भाव स्पष्ट होत जातात. "ज्या लोकांसाठी अब्राहम लिंकन यांनी आपल्या राष्ट्राची अखंडता टिकवून ठेवली त्यांच्या हृदयात आणि या मंदिरात त्यांची आठवण सतत तेवत राहील." असे शब्द या पुतळ्याच्या वरच्या बाजूला ठळक अक्षरात कोरून ठेवले आहेत. दोन हात बाजूच्या हँडरेस्टवर टेकवून ऐटीत खुर्चीवर विराजमान असलेली लिंकन यांची सुटाबुटातली प्रतिमा विलक्षण लक्षवेधक आहे. सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने पहाता त्यांची गणना कांही देखण्या लोकांमध्ये होणार नाही. पण त्या पुतळ्याचा आकार, रेखीवपणा, समोरील वॉशिंग्टन स्मारक आणि कॅपिटांलच्या दिशेला वळवलेली करडी नजर वगैरे सारे पाहण्यासारखे आहे. लिंकन यांनी केलेल्या कांही महत्वाच्या भाषणांमधले उतारे दोन्ही बाजूंच्या भिंतींवर कोरून ठेवले आहेत.  तिथे आलेले पर्यटक अब्राहम लिंकन यांच्या पुतळ्याच्या पार्श्वभूमीवर आपापले फोटो काढून घेण्यात मग्न होते. थोडे लोक त्यांच्या भाषणांमधले उतारे तिथेच उभे राहून वाचत होते किंवा घरी जाऊन सावकाशपणे वाचण्यासाठी त्यांचेही फोटो काढून घेत होते. ती जागा प्रशस्त असली तरी तिथे खूप गर्दी होत असल्यामुळे जास्त वेळ थांबणे शक्य नव्हते.

लिंकन स्मारकाच्या पायऱ्या उतरत असतांनाच समोर लांबच लांब चौकोनी रिफ्लेक्शन पाँड, त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवळीचे रुंद पट्टे, पलीकडे भव्य वॉशिंग्टन स्मारकाचा गगनचुंबी खांब दिसत होताच तसेच त्याच्याही पलीकडच्या बाजूला असलेली वस्तुसंग्रहालये आणि सर्वात मागे  कॅपिटॉल हिलची इमारत वगैरे  दिसत होतेच. त्या वेळेपर्यंत दुपारच्या भोजनाची वेळ झाली होती. आमच्या कारपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला काही खाद्यपदार्थांच्या मोठमोठ्या गाड्या उभ्या होत्या आणि तिथे आलेले पर्यटक त्यांच्या समोर रांगा लावून उभे होते. त्या गाड्यांमधून बर्गर, पिझ्झा, पाश्ता, नूडल्स अशासारखे पदार्थ मिळत होते. आम्ही चांगला पोटभर नाश्ता घेतलेला असल्यामुळे कुणालाही जास्त भूक लागली नव्हती, शिवाय वाटेत चघळण्यासाठी आम्ही काही खुसखुशित पदार्थही आणलेले होते. त्यामुळे तिथले पदार्थ घेऊन न खाता आम्ही सरळ मोटारीकडे गेलो आणि आणलेले एक दोन पदार्थ तोंडात टाकून चघळत पुढच्या मार्गाला लागलो. 


तिथून दुसऱ्या कुठल्याही प्रेक्षणीय स्थळाकडे जातांना वाटेत वॉशिंग्टन मेमोरियल लागणार होतेच, ते पहात पहात व्हाइट हाउसकडे जायचे असे आम्ही ठरवले. वॉशिंग्टन मॉन्युमेंट ही एक प्राचीन काळातल्या युरोपीय पध्दतीतील ओबेलिस्क प्रकारची इमारत आहे. हा एक प्रकारचा चौकोनी खांब असतो आणि तो वरच्या बाजूने निमूळता होत जातो. हे मॉन्यूमेंट संगमरवर, ग्रॅनाइट आणि सँडस्टोन या जातींच्या दगडांमधून उभारले आहे. तो जगातील सर्वात मोठ्या आकाराचा प्रचंड ओबेलिस्क आहे, तसेच ते जगातील सर्वात उंच दगडी बांधकाम आहे.

पॅरिसचा आयफेल टॉवर उभा होण्यापूर्वीची कांही वर्षे वॉशिंग्टन मेमोरियल ही जगातील सर्वात उंच इमारत होती. सुमारे ५५५ फूट उंचीचा हा मनोरा एकाद्या पन्नास मजली इमारतीइतका उंच आहे. आजकाल यापेक्षाही उंच अशा कित्येक इमारती अमेरिकेतच नव्हे तर मलेशिया, दुबई यासारख्या देशातल्या शहरांमध्येही पहायला मिळतात, पण त्या सिमेंटकाँक्रीटच्या असतात. वॉशिंग्टन मेमोरियल बाहेरून खांबासारखे वाटत असले तरी ते आंतून पोकळ असून त्यात साडेआठशे पायऱ्यांचा जिना आहे, तसेच लिफ्टची सोयसुध्दा आहे. पण ११-७ च्या घटनेनंतर आंत जायला मनाई करण्यात आली आहे असे काहीसे आम्हाला पूर्वीच्या भेटीत सांगितले गेले होते. या वेळीही आम्हाला तिथे कुणी आत जाणारे, बाहेर पडणारे किंवा त्यासाठी रांगेत उभे असलेले लोक दिसले नाहीत. मॉन्यूमेंटच्या सभोवती प्रशस्त हिरवळ आहे आणि त्यात फुलांचे सुंदर ताटवे लावलेले दिसत होते. तिथे अनेक लोक बसले होते किंवा रमतगमत फिरत होते. त्या स्मारकाच्या जवळच्या रस्त्यावरून जात असतांना आम्ही आपल्या गाडीत बसूनच या स्मारकाचे दुरून दर्शन घेतले. जवळ जवळ दीडशे वर्षांपूर्वी आतासारखी यांत्रिक साधने उपलब्ध नसतांना त्या काळातल्या कामगारांनी जिवाचा धोका पत्करून एवढी उंच इमारत कशी बांधली असेल याचे आश्चर्यही वाटते आणि त्यांची खरोखरच कमाल वाटते.

चाळीस पन्नास वर्षांपूर्वी मी कुतुबमिनारमधल्या गोल जिन्याच्या पायऱ्या चढत आणि देव आनंद व नूतनची आठवण काढत वरपर्यंत गेलो होतो आणि एकदा टोरोंटोच्या उत्तुंग सीएन टॉवरमध्ये लिफ्टने वर गेलो होतो. पण पिसाच्या मनोऱ्यातही आम्हाला आतल्या जिन्याने वर चढून जायची संधी मिळाली नाही तशीच वॉशिंग्टन मेमोरियलमध्येही मिळाली नाही.  एखाद्या पर्वताच्या शिखरावर किंवा उंच इमारतीवर चढून दूरवर क्षितिजापर्यंत पसरलेला भाग पहाण्यात एक प्रकारचे थ्रिल असते. पूर्वीच्या काळातल्या लोकांना ती संधी क्वचितच मिळत असल्यामुळे त्याचे मोठे अप्रूप असणार.  पण जगातल्या सर्वात उंच पर्वतशिखरांच्याही वरून उडत जात असणाऱ्या विमानांमध्ये बसायची संधी मला कित्येक वेळा मिळाली आहे, शिवाय माझे अर्धे आयुष्य एकोणीसाव्या मजल्यावरच्या घरात गेले आहे आणि सध्याही मी सव्वीसाव्या मजल्यावर रहात आहे. त्यामुळे रोजच असे विहंगम दृष्य पहायची मला सवय झाली आहे.


अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेले व्हाइटहाउस एकदा आत जाऊन पहावे असे कुणालाही वाटेल. पण सुरक्षेच्या कारणामुळे पूर्वीच्या भेटीतही आम्हाला त्या इमारतीच्या गेटपर्यंतसुद्धा नेले नव्हते. मधले दोन तीन रस्ते सोडून लांबवर असलेल्या एका रस्त्यावर उभे राहून आम्हाला दुरूनच ती इमारत पहावी लागली होती. आजूबाजूला असलेल्या उंच झाडांमागे तिचा बराचसा भाग झाकलेलाच होता आणि जेवढा दिसत होता तो फारसा आकर्षक वाटला नाही. अर्थात व्हाइटहाउस ही अमेरिकेतली एक सर्वात जुनीपुराणी इमारत आहे आणि बांधायच्या वेळीच ती एकादे चर्च किंवा स्मारक म्हणून बांधलेली नसून माणसांच्या वास्तव्याचा विचार करून बांधली आहे. त्यात सौंदर्याचा जास्त विचार केला नसेल. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणजे आजच्या जगातला सर्वाधिक प्रभावशाली राजकारणी पुरुष त्या वास्तूत निवास करतो  आणि खुद्द राष्ट्रपतीचे कार्यालयसुद्धा याच इमारतीच्या परिसरात आहे. या कारणांमुळे तिला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे एवढेच. व्हाइट हाउसपासून दुरूनच जाणाऱ्या ज्या रस्त्यांवरून वाहतुकीला परवानगी होती अशा रस्त्यांवरून हळू हळू जात आम्ही गाडीतच बसूनच त्या वास्तूचे दर्शन घेतले, एका ठिकाणी थांबून आमच्या आठवणींसाठी फोटोही खेचले.


तिथून आम्ही मॉल भागात आलो. कॅपिटॉल बिल्डिंगसमोरील वॉशिंग्टन मेमोरियलच्या दिशेने पसरलेल्या प्रशस्त जागेला नॅशनल मॉल असे नाव दिले आहे. विविध प्रकारची अनेक वस्तुसंग्रहालये आणि इतर महत्वाच्या वास्तू या मॉलवरील हमरस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या केलेल्या आहेत. या मॉलच्याच वॉशिंग्टन स्मारकाच्या पलीकडल्या बाजूला एक लांबलचक रिफ्लेक्टिंग पाँड आहे आणि त्याच्या पलीकडे लिंकन मेमोरियल आहे. अमेरिकेच्या केंद्रीय सरकारचा कारभार कॅपिटॉल बिल्डिंग या इमारतीतून चालवला जातो.  अर्थातच तिथेसुद्धा अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असते. फक्त तिथे काम करणारे कर्मचारी आणि ज्यांना ऑफिशियल कामासाठी तिथे जाण्याचा परवाना मिळाला आहे असे लोकच तिथे जाऊ शकतात. आमच्याकडे त्या बिल्डिंगच्या जवळपास कोठेही जाण्याचा परवाना नव्हता. गाडीतच बसून जेथपर्यंत जाणे शक्य होते तेथवर जाऊन आम्ही दुरूनच त्या सुंदर इमारतीचे दर्शन घेतले आणि तिच्या आजूबाजूचा रम्य परिसर पाहून घेतला. ही वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुंदर आणि भव्य इमारत आहेच, तिचे शिखर वॉशिंग्टन मेमोरियल इतकेच उंच आहे. या दोन इमारतींसारखी तिसरी कोणतीही उंच इमारत या भागात बांधली गेली नाही. या इमारतींचे महत्व राखण्यासाठी तिथे यांच्यापेक्षा भव्य अशी नवी उंच इमारत बांधायला परवानगी मिळत नसेल.

आतापर्यंत पोटातली भूक जागृत व्हायला लागलेली असल्यामुळे नॅशनल मॉलवरच्या एखाद्या चांगल्या क्षुधाशांतिगृहात जाऊन जेवण करावे असे आम्हाला वाटत होते. तिथे तर रस्त्यावरून फिरणाऱ्या असंख्य लोकांची गर्दी होती, त्या सर्वांच्या खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था होत असणार अशी आमची खात्री होती. पण तिथेही कुठेच आमची मोटार उभी करायला जागाच सापडत नव्हती. तिथल्या गजबजलेल्या रस्त्यांवरून इकडून तिकडून चकरा मारत फिरत असतांना आम्ही व्हार्फ भागात आलो. त्या भागाला व्हार्फ म्हणतात हे ही आम्हाला माहीत नव्हते.  माझ्या पूर्वीच्या प्रवासात आम्हाला ही जागा दाखवली नव्हती.  तिथे कुठेतरी एका भूमीगत पार्किंग लॉटचा बोर्ड दिसला आणि आम्हाला हायसे वाटले. मी मोटारीतून उतरून रस्त्याच्या कडेला फुटपाथवर उभा राहिलो आणि मुलगा कार पार्क करायला आत घेऊन गेला. तो पाच मिनिटात बाहेर येईल अशी आम्हा दोघांचीही अपेक्षा होती. सून आणि नाती तिकडचा भाग पाहून एखादे चांगले हॉटेल शोधायला गर्दीतून पुढे चालल्या गेल्या आणि दिसेनाशा झाल्या. 

दहा मिनिटे होऊन गेली, पंधरा मिनिटे झाली, वीस मिनिटेही होऊन गेली तरी मुलगा बाहेर येतच नव्हता. मी आपला एकटाच रस्त्याच्या कडेला सावलीत उभा राहून किंवा एक दोन मिनिटे रस्त्याच्या कडेला एकाद्या बाकड्यावर टेकून इकडे तिकडे बघत वेळ घालवत होतो. त्या वेळेला माझ्याकडे पासपोर्टही नव्हता, खिशात एक डॉलरही नव्हता की क्रेडिट कार्डही नव्हते कारण सतत ग्रुपमध्येच रहायचे असल्यामुळे मला यातल्या कशाची गरज पडेल असे घरातून निघतांना वाटलेच नव्हते. माझा मोबाइल फोन खिशात होता, पण  मी इंटरनॅशनल रोमिंग घेतले नसल्यामुळे त्याचा तिथे काही उपयोग नव्हता. घरी असतांना मी वायफाय वरून जगभर वॉट्सॅप कॉल करू शकत होतो, पण इथे ती सोयही नव्हती. त्यामुळे मला अनोळखी लोकांच्या गर्दीत पण एकटा आणि असुरक्षित वाटायला लागले. मनातून थोडी चुळबुळ होत असली तरी कुणीतरी येऊन मला तिथून घेऊन जाणारच याचीही मनोमन खात्री होतीच. पण मी अधीर होऊन त्या लोकांना शोधण्यासाठी आपली जागा सोडली असती तर मात्र मी तिथल्या गर्दीमध्ये कदाचित हरवून गेलो असतो. म्हणून मी त्या एका जागेवरच थांबून राहिलो. तिथे मी असा का उगाचच एका ठिकाणी थांबलो आहे असे कदाचित पहाणाऱ्या कुणाला वाटलेही असते, पण बहुधा तिथल्या कुणाचेच माझ्याकडे लक्ष नसावे, मला काहीही विचारायला कुणीही जवळ आला नाही. अखेर माझी नात तिथे परत आली आणि मला आपल्यासोबत घेऊन गेली. 

त्या रस्त्याच्या कोपऱ्यावरच असलेल्या ऑयस्टर बार नावाच्या हॉटेलात त्यांना कसेबसे एक टेबल मिळाले होते. तिथेही लोकांची तुडुंब गर्दी होतीच, पण हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला जास्तीच्या टेबलखुर्च्या मांडून त्यांनी सोय केली होती. ऑयस्टर म्हणजे शिंपल्यातला प्राणी किंवा किडा जे काही असते तो जीव. त्यांचेही अनेक प्रकार असतात आणि त्यातल्या एका प्रकारच्या शिंपल्यात मोती तयार होतात. या ऑयस्टर्सना कच्चेच किंवा उकडून, भाजून किंवा तळून तयार करण्यात येणारे पदार्थ हे या हॉटेलचे वैशिष्ट्य होते आणि अशा पंधरावीस पदार्थांची यादी मेनूत दिलेली होती. मला तर ती वाचून त्यातले शब्दही समजत नव्हते. असले काही तरी चमत्कारिक पदार्थ खायच्या विचारानेच मला मळमळायला लागते. पण त्या हॉटेलात चिकन, फिश, प्रॉन्स, फ्राइड राइस  यासारखे ओळखीच्या नावांचे काही पदार्थ मिळत होते ते आम्ही मागवले. आपल्याकडच्या उडुपी हॉटेलांच्यासारखी तत्पर सर्व्हिस तिकडे सहसा नसते. बरेचसे लोक आधी एकादे पेय मागवून ते सावकाशपणे घोट घोट घेत बसलेले असतात. आम्ही सरळ जेवण मागवले असले तरी तिथले नोकर चेंगटपणा करतच होते.  एखादी वेट्रेस हातात ट्रे घेऊन आतून बाहेर आली की आम्हाला वाटायचे ती आपलेच जेवण घेऊन आली आहे, पण ती आम्हाला हुलकावणी देऊन दुसऱ्याच टेबलाकडे जायची.

अखेर एकदाचे आम्ही मागवलेले खाद्यपदार्थ टेबलावर आले आणि आम्ही ते खायला सुरुवात केली तेंव्हा कुठे माझा मुलगा धापा टाकत तिथे येऊन पोचला. त्याला यायला इतका वेळ का लागला याचे त्याने सांगितलेले कारण थक्क करणारे होते.  ज्या ठिकाणी पार्किंग उपलब्ध आहे असे सांगणारा मोठा बोर्ड होता आणि मी उभा राहिलो होतो त्याच्या बाजूलाच एक  डेस्क होता आणि एक लहान बोर्ड होता. त्यानुसार तिथे वॅले पार्किंगची व्यवस्था केलेली होती, पण त्यासाठी साठ सत्तर डॉलर भरायचे होते. आम्हाला जेमतेम अर्धा पाऊण तास थांबून थोडेसे खाऊन पिऊन लगेच पुढे जायचे होते. तेवढ्या वेळासाठी उगाच इतके पैसे कशाला खर्च करायचे आणि आपली गाडी अनोळखी माणसाच्या ताब्यात द्यायची का? अशा विचाराने मुलाने तिकडे दुर्लक्ष करून गाडी स्वतःच चालवत आत नेली. पण आत शिरल्यावर तिथून पुढे जाणारे एक मोठे भुयार होते आणि मैलभर अंतरावर त्या बोगद्याच्या दुसऱ्या टोकाला गाड्या पार्क करायची जागा होती. तिथे आपली गाडी लावून तो दुसऱ्या बाजूने बाहेर पडला होता आणि हॉटेल शोधत शोधत आमच्यापर्यंत येऊन पोचला होता. 

जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे एकत्रच बाहेर पडलो आणि चालत चालत कार पार्किंगच्या दिशेने निघालो. तो रस्ता वॉशिंग्टन डीसीच्या फेरी व्हार्फचा  मुख्य रस्ता होता. हे शहर पोटोमॅक या अमेरिकेतल्या एका मोठ्या नदीच्या काठी वसवले गेले आहे. तिथून काही मैल पुढे वहात गेल्यावर ही नदी अॅटलांटिक महासागराचा भाग असलेल्या एका आखाताला जाऊन मिळते. या ठिकाणीच त्या नदीचे पात्र चांगले रुंद आहे आणि पुढे ते अधिकाधिक रुंद होत जाते. मासेमारी करण्यासाठी किंवा जलविहार करण्यासाठी इथून जाणाऱ्या येणाऱ्या लहानमोठ्या नौकांसाठी या बंदराचा उपयोग केला जातो. आम्हाला रस्त्याच्या पलीकडल्या बाजूला नदीच्या काठाशी उभ्या केलेल्या शेकडो नौका दिसत होत्या आणि बहुधा तितक्याच किंवा जास्तच नावा पाण्यावर सफर करायला गेलेल्या असाव्यात. काही मोठ्या नावा जरा खोल पाण्यात नांगर टाकून उभ्या केलेल्या होत्या.  त्या नावांवर खाणेपिणे, नाचगाणे या सगळ्यांची व्यवस्था करून धमाल पार्ट्या केल्या जातात. आम्ही युरोपदर्शनाला गेलो होतो तेंव्हा वीस दिवसात असे तीन क्रूज अनुभवले होते. त्या भागात आणि त्या नौकांवरसुद्धा सगळीकडे खूप दिवे लावलेले होते आणि रात्री तिथे नक्कीच दिव्यांचा झगमगाट आणि वाद्यांचा गलबलाट होत असणार.

काही लोकांच्या मनात वॉशिंग्टन, जेफरसन, लिंकन यासारख्या इतिहासकाळातल्या महान लोकांच्याबद्दल खूप आदरभाव असतो, त्यांची स्मारके पहायची उत्सुकता असते, तर काही लोकांना निरनिराळी म्यूजियम्स पहायचा शौक असतो. जगभरातले असे उत्सुक आणि उत्साही लोक वॉशिंग्टन डीसीला येत असतात. पण या गोष्टी एकदा पाहिल्या की ती उत्सुकता कमी होते. त्यापेक्षाही जास्त लोकांना मौजमजा करायची आवड असते आणि ती कितीही वेळा करता येते. अमेरिका ही तर चंगळवादी राहणीमानाची जननी आहे. तिथे मौजमजा करण्यासाठी सगळ्या गावांमध्ये रेस्तराँ, पब्स, क्लब्स, पार्क्स,  रिसॉर्ट्स वगैरे तर असतातच, अनेक ठिकाणी खास प्रकारचे अॅम्यूजमेंट पार्क असतात. अमेरिकेतले लोक जरा मोकळा वेळ मिळाला की कुठे जाऊन कशी मौजमस्ती करायची याचा विचार करत असतात. 

माझ्या पहिल्या अमेरिकावारीत आम्ही ख्रिसमसला फ्लॉरिडामधील समुद्रकिनाऱ्यावरील सेंट ऑगस्टीन नावाच्या गावी गेलो होतो. तिथेही थोडी मौजमस्ती धमाल होती, पण ती एकाद्या खेड्यातल्या जत्रेसारखी होती. तिथे छोट्या छोट्या किरकोळ वस्तू विकणाऱ्या लहान लहान दुकानांची, खाद्यपेयांच्या ढाब्यांची आणि त्यामधून पायी चालत फिरणाऱ्या सर्वसामान्य लोकांची गर्दी होती. माझ्या दुसऱ्या अमेरिकाप्रवासात मी कॅलिफोर्नियातल्या लॉस एंजेलिस शहराजवळ असलेल्या सँटा मोनिकाचा समुद्रकिनारा पाहिला होता. तिथेही  जगभरातून जिवाची अमेरिका करायला आलेल्या टूरिस्टांची प्रचंड गर्दी नेहमीच असते. तिथे चांगला लांबलचक आणि सुंदर असा बीच तर आहेच, शिवाय बीचवरच एक मोठा अॅम्यूजमेंट पार्क आहे. तिथे अनेक प्रकारच्या राइड्स आहेत, अनेक प्रकारच्या मनपसंत खाद्यंतीसाठी भरपूर ठिकाणे आहेत. तळलेले चविष्ट खेकडे आणि मासे यांचे पदार्थ ही तिथली स्पेशॅलिटी आहे. शिवाय गाणी गाणारे, वाद्ये वाजवणारे, जादूचे किंवा सर्कससारखे खेळ दाखवणारे, तिथल्या तिथे रेखाचित्र काढून देणारे वगैरे कलाकारही रस्त्याच्या कडेला आपल्या करामती दाखवत असतात. त्यामुळे एक जत्रा भरल्यासारखे मनमौजी वातावरण असते. तशीच किंवा त्याहूनही जास्त गजबज मी सॅनफ्रान्सिस्कोच्या फेरी व्हार्फवर पाहिली होती.  

त्यांच्या तुलनेत लास व्हेगास म्हणजे तर एक मोठा जागतिक कुंभमेळा होता. तिथे सगळ्या खंडांमधले निरनिराळ्या वंशाचे आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक निरनिराळ्या चित्रविचित्र पोषाखांमध्ये दिसत होते. त्यात कोणी लालबुंद गोरे, कोणी काळे कुळकुळित, कोणी पीतवर्णीय, कोणी ताडमाड उंच तर कोणी अतीशय बुटके, कोणी गलेलठ्ठ, कोणी काटकुळे, कोणी म्हातारे, कोणी तरुण, कुणाबरोबर लहान लहान मुले अशा सगळ्यांचा त्यात समावेश होता, पण सगळ्यांच्या अंगातून बेदरकार वृत्ती, पुरेपूर उत्साह आणि उत्सुकता ओसंडून वाहतांना दिसत होती. आम्हीसुद्धा कधी दुकाने आणि कधी माणसे यांच्याकडे पहात पहात आणि त्यांच्यावर कॉमेंट्स करत पुढे पुढे जात होतो. काही रस्त्यांवर म्हणजे फुटपाथवर ऐसपैस मोकळी जागा होती. तिथे गाणी म्हणणारे, वाद्ये वाजवणारे, नाच करणारे, जादूचा खेळ करणारे, हसवणारे विदूषक असे नाना प्रकारे मनोरंजन करणारे कलाकार आपापले खेळ दाखवत होते. 

या सगळ्या अनुभवांची आठवण येईल असे वातावरण  वॉशिंग्टन डीसीच्या फेरी व्हार्फ भागात दिसत होते. तरीही आम्ही दुपारच्या वेळी तिथे फिरत होतो त्या वेळी जरा सुस्त वातावरण होते. संध्याकाळी तिथे तुफान गर्दी होईल आणि रात्री दंगा मस्ती धमाल होईल अशी लक्षणे दिसत होती. आपल्या रोजच्या जीवनातल्या रामरगाड्यापासून दूर जाऊन चार घटका निव्वळ मौजमस्ती करण्यासाठी काही लोक आपापल्या कोंदट घरट्याबाहेर पडून  स्वच्छंद, धुंद हवेत तरंगत असतात, पण आम्हाला रात्रीपर्यंत आपल्या घरी परत जायलाच हवे होते. त्यामुळे आता नॅशनल मॉलवरील एकादे म्यूझियम पाहून परत फिरायचे असे आम्ही ठरवले. वॉशिंग्टनमधल्या रस्त्यांवरून फिरत असतांना मला अचानक एका रस्त्याच्या कडेला चक्क स्वातंत्र्यदेवतेचे दर्शन घडले. पूर्वी मी न्यूयॉर्कच्या लिबर्टी स्टॅच्यूच्या परिसरात एक दिवस घालवला होता.  या वेळी तिच्या या प्रतिकृतीसोबत मिनिटभर उभा राहून पटकन एक फोटो काढून घेतला.


माझ्या मागच्या भेटीत मी तिथले एरोस्पेस म्यूझियम पाहिले होते. राइट बंधूंनी उडवलेल्या पहिल्या विमानापासून ते सुपरसॉनिक जेटपर्यंत निरनिराळ्या प्रकारची विमाने आणि निरनिराळी रॉकेट्स, सॅटेलाइट्स वगैरेंची संपूर्ण सचित्र माहिती आणि त्यांची पूर्णाकृति मॉडेल्स यांचेसह एक अत्यंत आकर्षक असे प्रदर्शन या ठिकाणी होते.  मी आतापर्यंत भारतात आणि परदेशांमध्ये जितकी वस्तुसंग्रहालये किंवा प्रदर्शने पाहिली आहेत, त्यात मला हे प्रदर्शन सर्वात जास्त आवडले होते.  पंधरा वर्षांनंतर ते पुन्हा पहायलाही माझी हरकत नव्हती आणि दुसरे एकादे प्रदर्शन पहायलाही मला आवडलेच असते. त्या ठिकाणी याशिवाय नॅचरल हिस्टरी, आफ्रिका, आशिया आणि अमेरिकन (रेड) इंडियन लोकांच्या कलाकृती यासारखी काही म्यूझियम्स आहेत. आम्ही हातातल्या मोबाइलवर त्यांची माहिती वाचत आणि त्या इमारतींना बाहेरून पहात हळूहळू जात होतो, पण कुठल्याही इमारतीच्या आवारात किंवा बाहेरच्या रस्त्यावर मोटार उभी करता येण्याची कणभरही शक्यता नव्हती. मागच्या वेळेस आमची टूरिस्ट बस आम्हाला एका ठिकाणी सोडून दूर निघून जायची आणि ठराविक वेळेनंतर पुन्हा त्याच ठिकाणी येऊन आम्हाला दुसऱ्या स्पॉटकडे घेऊन जायची. या वेळची परिस्थिती वेगळी होती. आमची मोटरगाडी कुठे उभी करून ठेवायची हीच सगळ्यात मोठी अडचण होती. म्यूझियम्सच्या माहितीमध्ये असेही समजले की त्यातली काही म्यूझियम्स साडे चार वाजताच बंद होणार होती. त्यामुळे आम्ही दूर कुठेतरी गाडी पार्क करून तिथे परत येण्यासाठी वेळही नव्हता आणि ते करण्यासाठी  तिथे कशा प्रकारचे पब्लिक ट्रान्स्पोर्ट उपलब्ध असतील हेही माहीत नव्हते.

निराश होऊन  इकडेतिकडे पहात  फिरत असतांना अमेरिकन आर्ट सेंटरजवळ उजव्या दिशेला वळून थोडे पुढे गेल्यावर रस्त्याच्या कडेला एक रिकामी जागा दिसली.  ते म्यूझियम संध्याकाळी साडेसातपर्यंत उघडे राहणार होते.  मग तेच पहायचे ठरवले, गाडी तिथे उभी केली आणि काठी टेकत टेकत दहा पंधरा मिनिटे चालत त्या सेंटरमध्ये गेलो. त्या तीन मजली बिल्डिंगच्या प्रत्येक मजल्यावर दोन्ही बाजूंना अनेक हॉल्समध्ये अनेक सुरेख कलाकृती मांडून ठेवल्या होत्या. एकाद्या कलाप्रेमी रसिकाला किंवा कलांच्या विद्यार्थ्याला त्या सगळ्या नीट निरखून पहायला पूर्ण दिवस लागला असता, पण आमच्या ग्रुपमधल्या कुणालाही ते पाहण्यात दीडदोन तासाहून जास्त इंटरेस्ट आणि पेशन्स असेल असे मला वाटत नव्हते. दिवसभर फिरण्यामध्ये बरीच शक्ती खर्च झाली असल्यामुळे माझ्या अंगात तोपर्यंत तेवढेही त्राण उरले नव्हते. आत गेल्यावर मला एक वेटिंग रूमसारखी खोली दिसली, तिथे काही बेंच आणि खुर्च्या ठेवल्या होत्या. मी त्यातल्या एका जागी बसून घेतले आणि बाकीच्या लोकांनी ते प्रदर्शन बघून यावे असा प्रस्ताव मांडला.

दोन मिनिटांमध्येच माझा मुलगा त्या म्यूझियममधलीच एक व्हीलचेअर घेऊन आला आणि मला त्यात बसवून सगळ्यांनी आळीपाळीने ढकलत सर्व मजल्यांवरील बहुतेक सगळ्या खोल्यांमध्ये फिरवून आणले.  या अमेरिकन आर्ट सेंटरमधल्या सगळ्या कलाकृती अमेरिकन कलाकारांच्याच होत्या आणि मला तर त्यातल्या कुणाचीही नावेही माहीत नव्हती. पोर्ट्रेट्स सेक्शनमध्ये अमेरिकेतले पुढारी, शास्त्रज्ञ, नटनट्या, खेळाडू वगैरेंच्या सुरेख तसबिरी होत्या. मला त्यांच्यातले फक्त एडिसन आणि टेसला यांच्यासारखे थोडेच महान लोक माहीत होते. 

प्रत्येक चित्राबरोबर त्या व्यक्तीची माहितीही दिली होती, त्यांनी कुठकुठल्या क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक अशी कामगिरी केली होती ते लिहिले होते. अमेरिकेतल्या रहिवाशांना त्याच्याबद्दल आदरभाव वाटत असेल, पण मला अमेरिकेचा इतिहास किंवा तिथली संस्कृति यात फार रस असण्याचे कारणच नव्हते कारण मी तिथला 'दो दिनका मेहमान' होतो. मी यापूर्वी लॉसएंजेलिसमधले गेट्टी सेंटर म्यूझियम पाहिले होते. तिथे मुख्यतः युरोपमधल्या जुन्या काळातल्या प्रसिद्ध कलाकारांच्या दुर्मिळ कलाकृती पाहिल्या होत्या. त्यांच्या मानाने मला या अमेरिकन आर्टिस्टांच्या कलाकृती तितक्या आकर्षक वाटल्या नाहीत.  तरीही त्या पहात आणि त्यांचे कौतुक करत दीडदोन तास कसे गेले ते समजलेही नाही. तिथून बाहेर पडल्यानंतर मात्र आम्ही सरळ घरचा रस्ता धरला. तोपर्यंत सूर्यास्तही होऊन गेला. त्यामुळे रस्त्यातही येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांखेरीज आणखी काही पाहण्यासारखे नव्हतेच.