Thursday, November 23, 2023

शाश्वत ऊर्जा

 ऊन, वारा आणि नदीचा प्रवाह या निसर्गातील शक्तींचा उपयोग करून घेऊन आपले जीवन अधिकाधिक चांगले बनवण्याचे प्रयत्न मानव खूप पूर्वीपासून आजतागायत करत आला आहे. पूर्वी  वाऱ्यामधील ऊर्जेवर  शिडाची जहाजे चालत असत, हॉलंडमधले लोक पवनचक्क्यांचा उपयोग पाणी उपसण्यासाठी करत असत, लाकडाचे ओंडके आणि तराफे यांना पूर्वापारपासून नदीच्या पाण्याच्या सहाय्याने पुढे वहात नेले जात असे, मध्ययुगात काही ठिकाणी पाणचक्क्या बसवून त्यांच्या सहाय्याने यंत्रे चालवली जात होती. निसर्गामधील ऊर्जेच्या या साधनांचा उपयोग करून घेण्यासाठी ऊर्जेचे हे स्रोत (सोर्सेस) जिथे आणि जेंव्हा उपलब्ध असतील तेंव्हा त्या ठिकाणी जाऊन तिथेच आपले काम करणे शक्य असते. दुसरी गोष्ट म्हणजे या नैसर्गिक स्त्रोतांवर माणसाचे कणभरही नियंत्रण नसते. जेवढे प्रखर ऊन पडेल, जेवढ्या जोराचा वारा सुटेल आणि ज्या वेगाने पाणी वहात असेल त्यानुसार त्याला आपली कामे करून घ्यावी लागतात. 

अग्नी चेतवणे आणि विझवणे याचे तंत्र मानवाने अवगत करून घेतल्यानंतर ऊर्जेचे हे साधन मात्र त्याला केंव्हाही, कोठेही आणि हव्या तेवढ्या प्रमाणात मिळवणे शक्य झाले. अन्न शिजवणे, खनिजापासून धातू तयार करणे आणि त्यांना तापवून आणि ठोकून हवा तसा आकार देणे अशा अनेक कामांसाठी गरजेप्रमाणे चुली, शेगड्या आणि भट्ट्या वगैरे बांधून आपण आपल्याला गरज असेल तेंव्हा आणि पाहिजे त्या जागी अग्नीचा उपयोग करून घेऊ शकतो. या ऊष्णतेचा उपयोग करून यंत्रांची चाके फिरवता येतात आणि ती यंत्रे चालवून अनेक वस्तूंचे उत्पादन केले जाते. पण ऊष्णता ही ऊर्जासुद्धा जिथे निर्माण केली जाते तिथेच तिचा वापर करावा लागतो.

एका जागी असलेल्या वीजनिर्मितीकेंद्रात (पॉवर स्टेशनमध्ये) मोठ्या प्रमाणावर तयार झालेली वीज तारांमधून कितीतरी दूरपर्यंत नेता येते आणि तितक्या दूरवर पसरलेल्या शेकडो गावांमधल्या हजारो घरातले दिवे, पंखे, यंत्रे  वगैरेंना पुरवता येते.  वीज या प्रकारच्या ऊर्जेचे आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की  ध्वनी, प्रकाश, ऊष्णता, गतिज ऊर्जा (Kinetic Energy) यांच्यासारख्या ऊर्जेच्या इतर रूपांमध्ये तिचे परिवर्तन करणे सुलभ असते. त्यामुळे मानवाच्या जीवनात क्रांतीकारक बदल झाले. दिव्यांच्या उजेडात रात्री अभ्यास किंवा काम करणे शक्य झाले, कारखान्यांमधली अवजड यंत्रे विजेवर चालतात आणि आपल्याला लागणाऱ्या बहुतेक सगळ्या वस्तू तिथे तयार होतात, विजेवर चालणाऱ्या रेल्वेच्या इंजिनांमुळे प्रवास सुखकर झाला आहे. विजेच्या उपयोगामुळेच टेलिफोन, काँप्यूटर्स, इंटरनेट वगैरे अनंत उपकरणे चालतात, आपले रोजचे जीवन आता जवळजवळ पूर्णपणे विजेवर अवलंबून असते. एकाद्या देशाचा किंवा विभागाचा किती विकास झाला आहे याचे मोजमाप आता तिथे होत असलेल्या विजेच्या वापराशी निगडित झाले आहे.

जगातील विजेच्या उत्पादनातील साठ टक्क्याहून जास्त वीज आज कोळसा, तेल किंवा नैसर्गिक ज्वलनशील वायू ही इंधने जाळून तयार केली जाते. या वीजनिर्मितीकेंद्रांमध्ये इंधन जाळून निर्माण झालेल्या ऊष्णतेचा उपयोग करून पाण्याची वाफ तयार करतात आणि त्या वाफेने टर्बाइन नावाच्या यंत्राचे चाक फिरवले जाते. त्या चाकाला जोडलेल्या जनरेटरमध्ये वीज तयार होते. पण इंधनाच्या ज्वलनामधून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूंमुळे वातावरणाचे प्रदूषण होते आणि आता हे प्रदूषण इतके वाढले आहे की पृथ्वीवरचे तापमान वाढून सगळ्या जीवसृष्टीवरच भयानक संकटे येण्याची भीती आहे. शिवाय या भूमिगत इंधनांचा मर्यादित साठा कधीतरी संपणारही आहे. यावर जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे आणि औष्णिक वीजकेंद्रांवर कडक बंधने घालण्यात येत आहेत. त्यांची संख्या कमी कमी करत हळूहळू ती शून्यावर आणायचा विचार आहे. पण आजचे जीवन सुरळीतपणे चालवण्यासाठी विजेचा वापरही अत्यावश्यक आहे. म्हणून वीजनिर्मितीचे पर्यायी मार्ग शोधले जात आहेत.  त्यात पुनर्निर्मितीक्षम स्रोतांपासून (रिन्यूएबल एनर्जी सोर्सेसपासून) तयार केल्या जाणाऱ्या शाश्वत ऊर्जेला विशेष महत्वाचे स्थान आहे. या ऊर्जेसाठी लागणारे घटक निसर्गाकडूनच मिळणारे असल्यामुळे ते अनंत काळपर्यंत मिळत रहावेत अशी अपेक्षा आहे.

जलऊर्जा (हैड्रोइलेक्ट्रिक पॉवर) हे शाश्वत ऊर्जेचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. यात पाण्याच्या प्रवाहामुळे फिरणारे चाक वीज तयार करते. आभाळातून पडणाऱ्या पावसाचे पाणी धरणांमध्ये येत राहते आणि वीज उत्पादनासाठी धरणामधून खाली सोडलेल्या पाण्याची त्यातून भरपाई होत असते. विजेचे उत्पादन करण्याच्या क्रियेत ते पाणी नष्ट होत नाही. तेच पाणी पुढे कृषी आणि इतर उपयुक्त कामांसाठी वापरता येते. या ऊर्जानिर्मितीत जमीन, पाणी किंवा वातावरणाचे प्रदूषण होत नाही. या प्रकारच्या विजेचे उत्पादन गेली शंभरावर वर्षे होत आले असल्यामुळे त्यामधील तंत्रज्ञान आणि त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री चांगली परिचयाची आहे. पण आतापर्यंत बहुतेक सगळ्या नद्यांवर शक्य असतील तितकी धरणे बांधून झाली आहेत. आणखी नवीन धरणे बांधण्यासाठी जमीन संपादन करणे, त्यामधून विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन करणे यासाठी होणारा प्रचंड खर्च पाहता या क्षेत्रात अधिक वाढ होण्याला मर्यादा आहेत. सध्या जगातले सुमारे सोळा टक्के वीज उत्पादन पाण्यापासून होते, त्यात किती वाढ करता येईल हे पहावे लागेल.

अणूऊर्जा या प्रकारातून सध्या सुमारे दहा टक्के वीजनिर्मिति केली जाते. यात युरेनियम धातूच्या अणूच्या विखंडनातून बाहेर पडलेल्या ऊष्णतेचा उपयोग करून पाण्याची वाफ तयार करतात आणि त्या वाफेवर फिरणारे टर्बोजनरेटर वीज तयार करते. अणूभट्ट्यांमध्ये काही तीव्र किरणोत्सारी द्रव्ये तयार होतात त्यांना सध्या सुरक्षितपणे वेगळे ठेवले जाते, पण त्यांना नष्ट करता येत नाही आणि अपघाताने ती माणसांच्या संपर्कात आली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या भीतीमुळे अणूऊर्जेचा प्रसार बराच काळ मंदावला होता. पण या अणुविद्युतकेंद्रांमधून औष्णिक केंद्रांसारखे विषारी वायू वातावरणात सोडले जात नाहीत  त्यामुळे पर्यावरणाचा विचार करता अणुशक्तीवर पुनर्विचार सुरू झाला आहे आणि कदाचित भविष्यकाळात अशा प्रकारची अधिक केंद्रे बांधली जातील अशी शक्यता आहे. जगामधील युरेनियमचा साठाही मर्यादितच असल्यामुळे तोही कधीतरी संपेलच. त्यामुळे या विजेलाही शाश्वत म्हणता येणार नाही. पण पूर्णपणे शाश्वत ऊर्जेकडे वळेपर्यंत मधली काही दशके अणूऊर्जा आपली विजेची गरज भागवू शकेल आणि तिच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हासही होणार नाही. 

सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या शाश्वत ऊर्जांच्या दोन प्रकारांवरवर सध्या खूप भर दिला जायला लागला आहे. सूर्याच्या उन्हामधून पृथ्वीवर भरपूर ऊर्जा येत असते. पण त्या ऊर्जेचे विजेत रूपांतर करणे इतके सोपे नसते. आता ते तंत्रज्ञान विकसित होऊ लागले आहे. सोलर पॅनेल नावाच्या तबकड्यांवर बसवलेले सोलर सेल्स हे रूपांतर करतात. आधी त्यांची किंमत फार जास्त असल्यामुळे ही वीज परवडत नव्हती. आता त्याच्या किंमती आवाक्यात येऊ लागल्या आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा उपयोग करण्याच्या योजना आखल्या जात आहेत. पण ही वीज फक्त सूर्यप्रकाशातच तयार होऊ शकते त्यामुळे ती दिवसाच उपलब्ध असते, पण उजेडासाठी तिची रात्री गरज असते. त्यामुळे दिवसा तयार झालेली वीज बॅटऱ्यांमध्ये साठवून ठेवण्याची व्यवस्था करावी लागते. तेसुद्धा खूप खर्चिक असते. हे केंद्र दिवसभरातून फक्त काही तासच विजेचे उत्पादन करत असल्यामुळे या केंद्राची कार्यक्षमता कमी असते.

वाहत्या वाऱ्याने फिरणाऱ्या चक्रांमधून पवनऊर्जा तयार केली जाते. पण फक्त काही ठिकाणीच जोरात वाहणारे वारे असतात आणि तेही वर्षातल्या काही काळातच वाहतात. तेवढा वेळच ही वीज निर्मिती होऊ शकते. अशा जागा शोधून काढून तिथे पवनचक्क्या उभ्या करण्याचे काम चालू आहे, पण याला निसर्गाच्याच मर्यादा आहेत. या पवनऊर्जेतसुद्धा मिळेल तेंव्हा वीज तयार करून तिचा वापर इतर वेळी करण्यासाठी व्यवस्था करावी लागतेच. या केंद्रांची कार्यक्षमता कमीच असते.

जैवऊर्जा (बायोएनर्जी) नावाचा शाश्वत ऊर्जेचा आणखी एक प्रकार आहे. वनस्पती आणि प्राणिमात्रांची शरीरे ज्या असंख्य सूक्ष्म पेशींपासून बनतात त्यांचे रेणू (मॉलेक्यूल्स) मुख्यतः कार्बन, हैड्रोजन आणि ऑक्सीजन या मूलद्रव्यांनी भरलेले असतात. या सगळ्याला बायोमास असे म्हंटले जाते. झाडांची मुळे, खोडे, फांद्या, पाने. फुले, फळे वगैरे भाग आणि त्यापासून तयार केले जात असलेले कागद व कापड यासारखे कृत्रिम पदार्थ, तसेच प्राणिमात्रांचे मृतदेह, मलमूत्र वगैरे सर्वांचा समावेश या बायोमासमध्ये होतो. हे जैव पदार्थ कुजतात तेंव्हा काही सूक्ष्म जंतू या पदार्थांच्या अवाढव्य रेणूंचे विघटन करून त्यापासून लहान लहान आणि साधे रेणू वेगळे करतात. त्यातून कार्बन व हैड्रोजन यांची मीथेनसारखी वायुरूप संयुगे (काँपौंड्स) निघतात. त्यांना बायोगॅस म्हणतात. या ज्वलनशील वायूला जाळून त्यामधून ऊर्जेची निर्मिती करता येते. हीच जैवऊर्जा झाली. हा बायोगॅस स्वयंपाकघरातला एलपीजी (लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस) आणि वाहनांमध्ये भरला जाणारा सीएनजी (काँप्रेस्स्ड नॅचरल गॅस) यांच्यासारखाच असतो. गोबर गॅसच्या स्वरूपात ही ऊर्जा खेड्यापाड्यांमधून उपयोगात आणण्याचे प्रयत्न बरेच वर्षांपासून चाललेले आहेत. अधिक मोठ्या प्रमाणात या गॅसचे उत्पादन करून त्यापासून विजेची निर्मिती केली तर त्यांमुळे भारत विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकेल. पण जितका बायोमास आपण जाळू तितकाच नवा बायोमास निर्माण करता येणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन झाडे लावणे आणि त्यांना वाढवणे यांच्यावर लक्ष द्यावे लागेल. ते जमले तरच ही शाश्वत ऊर्जा होईल.  बायोमासच्या ज्वलनामुळेसुद्धा हवेत कार्बन डायॉक्साइड वायू टाकला जाईलच, पण नवीन वृक्षांच्या वाढीत तो शोषला जाईल आणि वातावरणातला समतोल कायम राहील. 

शहरामध्ये रोज गोळा होणारा टनावधी कचरा ही नगरवासियांपुढे असलेली एक मोठी समस्या आहे. त्याचे काय करायचे हेच उमजेनासे झाले नसल्यामुळे तो नष्ट करणे हेच महत्वाचे आहे. अशा वाया जाणाऱ्या कचऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती केली तर त्याचेपासून सुटका होईलच, शिवाय त्यापासून ऊर्जा निर्माण करून तिचा वापर करता येईल. यामुळे शहरांसाठी हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे. बायोगॅसच्या निर्मितीपर्यंत होणारा खर्च नगरविकासाखाली केला (म्हणजे गॅस फुकट मिळवला) आणि त्यापासून पुढे वीजनिर्मिती करण्याचा खर्च वीजग्राहकाकडून वसूल केला तर ती वीज माफक दरात प्राप्त करता येईल. या कारणाने शहरांमध्ये अशा प्रकारे ऊर्जेची निर्मिती करणे गरजेचे आहे. शहरातला नागरिक टाकाऊ जैव वस्तूंचे काहीही करू शकत नाही किंवा त्या साठवूनही ठेवू शकत नाही, त्यामुळे त्यांचा योग्य प्रकारे निचरा करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर येते.

पण खेड्यांमधली परिस्थिती वेगळी आहे. भाजीची साले, फोलपटे, देठ, पालापाचोळा, उरलेले अन्न, गवत वगैरे गोष्टी तिथे जनावरांना खाऊ घातल्या जातात, त्यांचे शेण आणि उरलेला चुरा, भूसा वगैरेंचासुध्दा खत म्हणून किंवा ज्वलनासाठी उपयोग केला जातो. त्यामुळे जैव कचऱ्यापासून मुक्ती मिळवणे हा तिथे इतका मोठा प्रश्न नाही. वीजउत्पादन करण्यासाठी भरपूर बायोमासाचा सतत पुरवठा करावा लागेल आणि तो उत्पन्न करण्यासाठी एलेफंट ग्रास, जट्रोपा यासारखी लवकर वाढणारी खास झाडे मुद्दाम लावून वाढवली,  अन्नधान्ये, तेलबिया, ऊस, कापूस, पालेभाज्या, फळफळावळ यासारख्या उपयुक्त पिकांऐवजी शेतात ही झाडे लावली आणि त्यांच्यापासून तेवढेच किंवा जास्त उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा बाळगली तर त्याला लागणारा खर्चसुध्दा विजेच्या उत्पादनखर्चात धरावा लागेल आणि ते केले तर ही वीज केवढ्याला पडेल हे पहावे लागेल.

वीज निर्माण न करताही जैवऊर्जेचा उपयोग पूर्वीपासून रोजच्या जीवनात  केला जात आहेच ते ही थोडे पाहू. सूर्यप्रकाशात झाडांची पाने हवेमधील कर्बद्विप्राणील (कार्बन डायॉक्साइड) वायू ग्रहण करतात आणि त्यामधील कार्बन अणूचा पाणी व इतर क्षारांसोबत संयोग घडवून त्यातून निरनिराळ्या सेंद्रिय (ऑर्गॅनिक) पदार्थांचे अणू तयार करतात. या प्रक्रियेत कर्बद्विप्राणील वायूमधील प्राणवायूचे (ऑक्सीजनचे) हवेत उत्सर्जन केले जाते आणि सूर्यप्रकाशामधील ऊर्जा सेंद्रिय पदार्थांमध्ये सुप्त रासायनिक ऊर्जेच्या (केमिकल पोटेन्शियल एनर्जी) स्वरूपात साठवून ठेवली जाते. हे सेंद्रिय पदार्थ झाडांच्या निरनिराळ्या भागांमध्ये पाठवून देऊन तिकडे ते साठवले जातात. त्यांच्यावरच जगातील इतर सर्व पशुपक्षी, कृमीकीटक, मासे वगैरे सजीवांचे प्रत्यक्ष किंवा परोक्ष रीतीने पोषण होते. या सेंद्रिय पदार्थांचे ज्वलन होत असतांना त्यांच्यामध्ये सुप्त असलेली ऊर्जा पुन्हा प्रकट होते. ही जैव ऊर्जा दोन प्रकारांने उपयोगात आणली जाते. 

वर दिल्याप्रमाणे सेंद्रिय पदार्थ कुजवून त्यातून जैव वायू (बायोगॅस) बाहेर काढून तो जाळणे हा अलीकडील काळातला उपाय आहे. लाकडाच्या किंवा सुकलेल्या पालापाचोळ्याच्या स्वरूपातील त्या पदार्थांनाच जाळून ऊष्णता निर्माण करणे हे माणसाला अग्नीचा शोध लागल्यापासून आजतागायत चालत राहिले आहे. भूगर्भामधील दगडी कोळसा आणि खनिज तेल हेसुध्दा लक्षावधी किंवा कोट्यावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर जगत असलेल्या वनस्पतींपासूनच निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या ज्वलनातून मिळणारी ऊर्जासुद्धा मुळात सौर ऊर्जेपासून तयार झालेली आहे असेही म्हणता येईल. जैव ऊर्जेचा माणसाच्या कामासाठी उपयोग करण्यात तसे काहीच नवीन नसले तरी हा उपयोग अधिकाधिक कार्यक्षम रीतीने करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत.

खेडी आणि लहान नगरे या भागात मुख्यतः स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या चुली, शेगड्या वगैरेंमध्ये सुधारणा करून त्या जास्त कार्यक्षम कशा करता येतात यासाठी प्रयत्न होत आहेत. काही नव्या सुधारणांमुळे इंधनाची बचत होईल, तसेच धुराचा त्रास होणार नाही आणि त्यामुळे होणारे हवेचे प्रदूषण कमी करता येईल असा तिहेरी लाभ होतो. खेड्यांमधील काही महिला जळणासाठी लाकूडफाटा गोळा करणे, शेणाच्या गोवऱ्या थापणे, त्या वाळवणे आणि ते जाळून त्यावर स्वयंपाक करणे यावरच दररोज निदान तीन चार तास घालवतात.  आधुनिक बायोगॅस शेगडीवर त्यांचा सगळा स्वयंपाक एका तासात तयार होऊ शकतो. अर्थातच उरलेल्या वेळात त्या कुक्कुटपालन, दूधदुभते यासारखे कोणतेही दुसरे उत्पादक काम करू शकतात. शिवाय स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इंधनाची बचत होते.  परंपरागत पध्दतीच्या चुलीशेगड्यांमध्ये लाकूडफाटा, पालापाचोळा वगैरे जाळल्याने त्यामधील फक्त दहावीस टक्के ऊर्जेचा उपयोग होतो आणि उरलेली बरीचशी ऊर्जा वाया जाते, पण तिच्या लहान लहान चपट्या गोळ्या (पेलेट्स) किंवा कांड्या बनवून त्या खास प्रकारच्या भट्ट्यांमध्ये जाळल्या तर त्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येतो. जैववस्तुमानाचा भुगा करून त्यांना यंत्रात घालून चेपून त्याच्या गोळ्या किंवा कांड्या बनवल्यास त्यांची साठवणूक आणि वाहतूक करणे, तसेच त्यांना शेगडी किंवा भट्टीमध्ये भरणे सोपे जाते आणि ते काम स्वयंचलित यंत्रांद्वारे करता येते.

रसायने, रंग, औषधे वगैरे तयार करणाऱ्या अनेक प्रकारच्या कारखान्यांमध्ये चालणाऱ्या प्रक्रियांसाठी लागणारी ऊष्णता बॉयलर्समध्ये खनिज तेल जाळून मिळवली जाते. त्यामधील  कमी तपमानावरील ऊष्णता निर्माण करण्यासाठी सौर ऊर्जेचा उपयोग करता येईल. उन्हात ठेवलेल्या विशिष्ट प्रकारच्या नळ्यांमध्ये पाणी तापवून ते तप्त पाणी पुरेशा आकारांच्या पात्रांमध्ये (ड्रम्समध्ये) साठवायचे आणि ऊष्णता विनिमयस्कांद्वारे (हीट एक्स्चेंजरमार्गे) त्यामधील ऊष्णता संयंत्राला पुरवायची असे करता येते. आजकाल काही वसाहतींमध्ये गच्चीवर असे संयंत्र बसवून रहिवाशांना आंघोळीसाठी गरम पाणी नळातून पुरवले जाते. 

आता काही खाजगी कंपन्या आणि सेवाभावी संस्था अपारंपरिक ऊर्जेकडे गंभीरपणे लक्ष देऊ लागल्या आहेत. यातून नफा मिळवणे हा खाजगी कंपन्यांचा उद्देश असतो आणि निदान 'ना नफा ना तोटा' या तत्वावर सेवाभावी संस्था चालवणे आवश्यक असते. त्यामुळे त्यांचे प्रयत्न व्यावहारिक (प्रॅक्टिकल) असण्याची अधिक शक्यता असते. पण अपारंपरिक ऊर्जेसंबंधीच्या प्रत्येक बाबतीत  आज तरी 'अनुदान', 'सहाय्य' किंवा 'कायद्यानुसार करावी लागणारी गोष्ट' अशा प्रकारचे उल्लेख येतात. या अपारंपरिक ऊर्जा असल्या कुबड्यांवर अधिक काळ किंवा मोठ्या प्रमाणात उभ्या राहू शकणार नाहीत. सौर ऊर्जेपासून वीज तयार करण्यासाठी लागणारी सोलर पॅनेल्स किंवा पवनचक्कीमधील यंत्रसामुग्री यांचे उत्पादन करण्यासाठी आधी खूप ऊर्जा खर्च करावी लागते. ती ऊर्जा अन्य स्वस्त मार्गाने तयार करूनसुध्दा आपण स्वस्त दरात सौर किंवा वायुऊर्जा निर्माण करू शकत नसू तर त्याला फारसा अर्थ उरत नाही. फक्त सौर किंवा वातऊर्जेचाच वापर करून जर आपण त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार करू शकलो आणि तिचा उपयोग करून मिळणारी वीज वाजवी भावात मिळाली तरच हा पर्याय खऱ्या अर्थाने स्वावलंबी म्हणता येईल आणि शाश्वत ठरेल. औष्णिक ऊर्जेला ठाम नकार दिला तर भविष्यकाळात हे होऊ शकेल.

जैवऊर्जा (बायोएनर्जी) या बाबतीत बरीच आशादायी वाटते. स्वयंपाकघरात होत असलेल्या ज्वलनाच्या पारंपरिक पध्दतींमध्ये सुधारणा करून त्यातून ऊर्जेची बचत करणे आणि प्रदूषण कमी करणे हे तर उपयुक्तच नव्हे तर अत्यंत आवश्यक आहे आणि ते शक्य होत आहे असे दिसते. युकॅलिप्टस किंवा सुबाबूळ ही जलद वाढणारी झाडे मोठ्या प्रमाणावर लावून आणि योजनाबध्द पध्दतीने त्यांची कापणी करून त्यापासून संततऊर्जा निर्माण करण्याची स्वप्ने वीस काही दशकांपूर्वी पाहिली गेली होती. पण त्याबाबतीत निराशाच पदरी आली हा ताजा इतिहास आहे. त्यामुळे सुपीक जमीनीवर वृक्षांची लागवड करून त्यामधून ऊर्जा मिळवत राहण्याची कल्पना आजच्या घटकेला तितकीशी व्यवहार्य वाटत नाही. पण खनिज तेलाची उपलब्धता कमी होत गेली आणि त्याच्या किंमती अशाच वाढत गेल्या तर मात्र लवकरच जैवऊर्जा तुलनेने वाजवी भावात मिळू लागेल. टाकाऊ कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबरोबर त्यातून ऊर्जा निर्माण करणे तर नक्कीच लाभदायक आहे. त्याच्या मार्गात येणारे गैरतांत्रिक (नॉनटेक्निकल) अडथळे दूर करण्याची आवश्यकता आहे. यासाठी समाजाच्या प्रबोधनाची गरज आहे. 

या सगळ्याच्या सोबतीला किंवा अधिक अग्रक्रम देऊन रोजच्या जीवनात ऊर्जेचा वापरच कमी करून तिची शक्य तितकी बचत करणे महत्वाचे आहे. त्यासाठी सर्व अनावश्यक वापरावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. 

----

मी हा लेख विज्ञानधारा या मासिकासाठी लिहिला होता. तो या मासिकाच्या दिवाळी विशेषांकात (ऑक्टोबर नोव्हेंबर २०२३) प्रसिद्ध झाला आहे.

Wednesday, June 28, 2023

ज्ञानयोग. कर्मयोग आणि भक्तियोग

 माणूस निवृत्त झाल्यानंतर अध्यात्माच्या मार्गाला लागतो किंवा त्याने त्या मार्गाला लागावे अशी अपेक्षा असते. माझे वडील ५५ वर्षाचे असतांनाच त्या काळातल्या नियमांनुसार सेवानिवृत्त झाले होते आणि खरोखरच पूर्णवेळ भजन, पूजन,कीर्तन, प्रवचन वगैरेंमध्ये  मग्न असत. पण मी साठ वर्षांनंतर निवृत्त झालो तरी तेंव्हा मला तशी बुद्धी झाली नाही. ७५ वर्षे उलटून गेल्यानंतर अध्यात्म म्हणजे नेमके काय आहे याचा शोध घेण्याचा अल्पसा प्रयत्न केला आणि मला समजले तेवढे मी एका लेखात लिहिले होते. हे काम करत असतांनाच मला तत्वज्ञान या शब्दाचा वेगळा अर्थ समजला, त्यावर मी दुसरा लेख लिहून प्रसिद्ध केला होता. या मालिकेतले हे तिसरे पुष्प ज्ञानयोग, कर्मयोग वगैरेंवर देत आहे. मी हा लेख फेसबुकवर पाच भागात दिला होता. त्याच क्रमाने तो इथे देत आहे.  


ज्ञानयोग. कर्मयोग आणि भक्तियोग  भाग -१

भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करायच्या निमित्याने सगळ्या जगाला ज्ञानयोग. कर्मयोग आणि भक्तियोग हे तीन मार्ग धरायला सांगितले आहेत. या तीन्हीपैकी आपल्या इच्छेप्रमाणे कुठलाही मार्ग धरला तरी तो अखेर त्याच शिखराकडे घेऊन जातो वगैरे गोष्टी मी अनेक वेळा ऐकल्या किंवा वाचल्या आहेत आणि इतरांना सांगितल्याही असतील. पण मला स्वतःला त्यांचा अर्थ कधीच नीट समजला नाही असे आता वाटायला लागले आहे.

बऱ्याच लोकांना असे वाटते की पहिली वीसपंचवीस वर्षे शाळाकॉलेजात शिक्षण घेतांना ज्ञानमार्ग धरावा, चाळीसपन्नास वर्षे काम करतांना कर्मयोग पाळावा आणि नंतर उरलेले आयुष्य हरीहरी करत भक्तियोगात घालवावे असे सांगण्याचा उद्देश असेल. पण ते तसे नाही.


भाग -२ ज्ञानयोग

आपण शाळाकॉलेजात अनेक विषयांचा अभ्यास करतो, घरातले मोठे लोक आणि इतर लोकही सतत काही माहिती देत असतात, उपदेश करत असतात, पुस्तके वाचून आणि टीव्ही पाहून माहिती आणि विचार मिळत असतात,  अलीकडे तर इंटरनेट आणि वॉट्सॅपमधून आपल्यावर माहितीचा भडिमार होत आहे. या सगळ्यामधले जे आपल्याला चांगले समजले आणि लक्षात राहिले त्याला आपण ज्ञान (नॉलेज) म्हणतो. या ज्ञानामधून आपल्याला शहाणपणा, हुषारी मिळेल, त्यातून काही प्रमाणात यश, कीर्ती आणि संपत्तीसुद्धा प्राप्त होईल, पण परमेश्वर कसा भेटणार? मोक्ष कसा मिळणार? असा प्रश्न मला पडला होता कारण  गीतेमधल्या तीन्ही मार्गांचे हे अंतिम लक्ष्य असावे असे मला वाटत होते.

अलीकडेच एका पंडिताने मला असे सांगितले की मी जन्मभर विज्ञानतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करून या विषयांमधले जे थोडेफार ज्ञान मिळवले असेल ते मुळी 'ज्ञान' नाहीच. हे विश्व म्हणजे मोहमाया आहे आणि त्याला खरे समजणे हेच अज्ञान आहे. आपल्या आत्म्यावर या अज्ञानाची अनेक पुटे चढलेली असतात. त्यांना बाजूला सारून जो आत्म्याची ओळख करून घेतो तो खरा 'ज्ञानी' आणि अंतरात्मा म्हणजेच परमात्मा हे अद्वैत समजून घेणे म्हणजे गीतेमधले 'ज्ञान'. हे ज्ञान मिळवण्यासाठी आधी मीपणा पूर्णपणे सोडून द्यायला हवा. मला, माझे असे काहीही मनातसुद्धा येता कामा नये. हे होण्यासाठी पूर्वसंचित असायला हवे आणि ज्ञानी सद्गुरु भेटला पाहिजे असेही म्हणतात.  यातले काहीच आपल्याला जमण्यासारखे नाही. ज्ञानमार्ग हा आपला मार्ग असू शकत नाही. त्या मार्गावर एक पाऊलसुद्धा टाकणे मला अशक्य वाटले.


भाग -३  कर्मयोग

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्माते संगोऽस्त्वकर्मणि ॥ 

हे गीतेच्या कर्मयोगाचे सूत्र आहे. "(हे माणसा), तुला कर्माविषयीच अधिकार आहे, फलाच्या ठिकाणी कधीही नाही. कर्माचा व फलाचा उद्देशही तुझ्या मनात असता कामा नये. इतके असूनही कर्म न करण्याची आसक्तीही तुला नको". असे या एका श्लोकात ग्रथित केलेले आहे. इथे कर्म या शब्दाचा अर्थ कर्तव्य असा घेतला आहे असे वाटेल. कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांच्या हितासाठी निरनिराळी कर्तव्ये ठरवलेली आहेत आणि सर्वांनी ती पाळावीत अशी अपेक्षा असते. कर्तव्य करतांना स्वतःच्या व्यक्तिगत नफातोटा पाहिला तर त्यामुळे इतरांचे नुकसान होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ बापाने आपले कर्तव्य पाळले नाही तर मुलांचे, शिक्षकाने कर्तव्य टाळले तर विद्यार्थ्यांचे आणि नागरिक बेपर्वा झाले तर देशाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कर्तव्यांच्या बाबतीत फळाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करायला हवेच. मग त्यात मोठा योग कसला आला  आणि  त्यातून मोक्ष कसा मिळणार किंवा ब्रह्म कसे भेटणार? असे वाटेल.

पण कर्तव्य हा कर्माचा एक लहानसा भाग आहे. त्याशिवायही माणूस सतत काही ना काही कर्म करतच असतो. हातापायांनी केलेले कामच नव्हे तर तोंडाने खाणेपिणे किंवा बोलणे, इतकेच काय पण मनात आलेले विचार, आखलेल्या योजना हेसुद्धा कर्मात येते. बहुतेक वेळा त्याला या कर्मांपासून काहीतरी लाभ मिळत असतो, पण कधीकधी तो मिळतच नाही. श्वास घेण्यासारखे कर्म नकळत होत असले तरी समजून उमजून केलेल्या कर्मांवर नियंत्रण ठेवावे, ते करतांना (सतत आणि फक्त) स्वार्थाचा विचार करू नये  किंवा "मी हे करून काय फायदा झाला?" असा विचारही मनात आणू नये असा कर्मयोगाचा अर्थ असावा असे मला वाटते. निरपेक्ष वृत्तीने काम करतांना हळूहळू आसक्ती कमी होते. मनासारखे न झाल्यामुळे होणारी निराशा, दुःख, राग वगैरेंचा त्रास होत नाही, मन शांत राहते, चित्तशुद्धी होते आणि त्यामुळे ज्ञानमार्ग सुकर होतो.  मानवी स्वभावानुसार त्याला काहीतरी आशा आकांक्षा असतातच, मोटिव्हेशनशिवाय काम करणे तसे सोपे नाहीच, पण तसा प्रयत्न करावा.


भाग ४  भक्तियोग 

ज्ञानयोगामध्ये अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करून स्वतःचा शोध घेणे असते, तर कर्मयोगामध्ये निरपेक्ष भावनेने निरासक्त वृत्ती बाळगून मनावर ताबा ठेवायचा असतो हे आधीच्या भागांमध्ये पाहिले आहे. या दोन्हींमध्ये कुठल्या देवाचा थेट संबंध यायची गरज नसते. पण भक्तीमार्गासाठी मात्र एकाद्या तरी देवतेवर अनन्य श्रद्धा असणे आवश्यक आहे. बहुतेक हिंदू लोकांच्या घरी दोनचार देवांच्या लहानशा मूर्ती, प्रतिमा, संतांच्या तसबिरी वगैरे असतात. ते त्यांना गंधफूलअक्षता हळदकुंकू वगैरे वाहून पूजा करतात, त्यांना निरांजनाने आणि उदबत्तीने ओवाळतात, नैवेद्य दाखवतात, अशा प्रकारचे काही उपचार करतात. अधूनमधून एकाद्या देवळात जातात, कधीकधी पंढरपूर, कोल्हापूर, तुळजापूर यासारख्या तीर्थक्षेत्रांना जाऊन पाया पडून येतात. ही सगळी भक्तीमार्गावरली सुरुवातीची पाउले आहेत.  संसाराचा गाडा सांभाळता सांभाळता जमेल तेवढा भक्ती भाव दाखवलेला असतो.

संत ज्ञानदेव, रामदास वगैरेंनी संसार केलाच नाही, तर संत नामदेव, तुकाराम यांच्यासारख्या भक्तांनी निरासक्त भावनेने संसार केला, पण ते त्यात रमले नाहीत. त्यांचे चित्त सतत विठ्ठलाला वाहिलेले होते. संत एकनाथ महाराजांनी एका अभंगात सांगितले आहे, 

आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे || १ ||

नको करू खेद कोणत्या गोष्टीचा | पती लक्षुमीचा जाणतसे || २ ||

सकळ जीवांचा करितो सांभाळ | तुज मोकलिल ऐसे नाही || ३ ||

जैसी स्थिती आहे तैशापरी राहे | कौतुक तू पाहे संचिताचे || ४ ||

एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा | हरिकृपे त्याचा नाश झाला || ५ ||


तर संत नामदेव म्हणतात,

देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ॥१॥

चरण न सोडी सर्वथा । आण तुझी पंढरीनाथा ॥२॥

वदनीं तुझे मंगलनाम । हृदयी अखंडित प्रेम ॥३॥

नामा म्हणे केशवराजा । केला नेम चालवी माझा ॥४॥


संत तुकारामांनी देवालाच असे दान मागितले आहे,

हेंचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥

गुण गाईन आवडी ।हेचि माझी सर्व जोडी ॥२॥

न लगे मुक्ति आणि संपदा ।संतसंग देई सदा ॥३॥

तुका ह्मणे गर्भवासी ।सुखें घालावें आह्मांसी ॥४॥

त्यांना तर या जन्मात धनसंपत्ती नको आहेच, पण मोक्षमुक्तीसुद्धा नको आहे.

ही संतमंडळी  समर्पण या भक्तीमार्गाच्या शिखरावर जाऊन पोचली होती.


भाग -५  समारोप

या तीन योगांशिवाय राजयोग नावाचा आणखी एक प्रकार आहे. त्यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशा पायऱ्यांमधून साधना केली जाते. भारतीय आणि हिंदू तत्वज्ञानामधील चार्वाक सोडून इतर सहा दर्शनांमध्ये मोक्षप्राप्ती हेच मानवाचे अंतिम ध्येय ठरवले आहे, किंबहुना त्यासाठीच मनुष्यजन्म मिळतो असे सांगितले आहे आणि त्यासाठी ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, राजयोग वगैरे मार्ग सांगितले आहेत. या मार्गांच्या उपयोगाविषयी सगळ्या विद्वान आचार्यांमध्ये एकमत नाही.  व्यक्ती तितक्या प्रकृति असल्यामुळे सरसरकट सगळ्या लोकांना सगळे मार्ग शक्य, योग्य किंवा पुरेसे आहेत असे त्यांना वाटत नाही. मग सामान्य माणसाची काय कथा? जगद्गुरु शंकराचार्यांनी ज्ञानमार्गाला प्राधान्य दिले आहे तर नंतर आलेल्या मध्वाचार्य, रामानुजाचार्य आदींनी भक्तीमार्ग आवश्यक आहे असे सांगितले. सर्व संतांनी भक्तीमार्गच सांगितला आणि त्याचा प्रचंड प्रसार झाला.  

ज्ञानयोग हा ज्ञानाचा मार्ग आहे. सत् आणि असत् यांचा विवेक आणि शास्त्रविचार ही याची प्रमुख अंगे आहेत. अध्यात्मामधील 'ज्ञान' या शब्दाला तत्त्वज्ञानीय अर्थ अभिप्रेत आहे. त्याची सुरुवात बुद्धीवादापासून होते आणि शेवट साक्षात्कारात होतो. ज्ञानयोगात तीन प्रगतीपर साधना असतात: श्रवण (ऐकणे), मनन (विचार/चिंतन करणे) आणि निध्यासन (सदैव सखोल ध्यान करणे). उपनिषदांतील चार महावाक्ये या चिंतनाचा विषय आहेत: ‘प्रज्ञानं ब्रह्म,’ ‘तत्त्वमसि,’ ‘अयमात्मा ब्रह्म’ आणि ‘अहम् ब्रह्मास्मि.’ ‘विवेकबुद्धीने सत् आणि असत् यांच्यामधील फरक जाणून घेणे आणि शेवटी स्वत:चे आणि परब्रह्माचे रूप एकच आहे, याचे ज्ञान होणे' हेच ज्ञानयोगाचे ध्येय आहे. सर्वसामान्य कुवतीच्या संसारी माणसाला हे शक्य नाहीच. त्यासाठी आधी निरीच्छ होऊन सर्व संसाराचा त्याग करून संन्यास स्वीकारणे अवश्य आहे असे मला वाटते. 

त्या मानाने कर्मयोग हा कार्य करण्याचा मार्ग थोडा तरी समजण्यासारखा आहे. आपण काय करू नये यापासून त्याची सुरुवात होते. त्यानंतर आपण स्वार्थी इच्छांपासून प्रेरित झालेल्या कार्याचा त्याग करावा. त्यानंतर जागृत मनोवृत्तीने आपल्या जीवनातले कर्तव्य करण्याची इच्छा होते. त्यानंतर कदाचित ज्ञानमार्गाकडे जाता येईल.

भक्तियोग हा परमेश्वराच्या भक्तीचा आणि परमेश्वरावर प्रेम करण्याचा मार्ग आहे.  देवाबद्दल कथा श्रवण करणे, भक्तिगीतांचे गायन करणे, तीर्थयात्रा करणे, मंत्रजप करणे आणि देवळांत आणि स्वगृही देवपूजा करणे या कृती या मार्गाची साधने आहेत. सरतेशेवटी परमेश्वराला पूर्णपणे शरण जाणे आहे.  कुठलीही पूजा विधि केल्यानंतर अखेरीस "तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु।" असे म्हणून त्या सत्कर्माचे फळसुद्धा परमेश्वराला देऊन टाकले जाते. हा निष्काम कर्मयोगाचा प्रकार आहे. भगवद्गीतेमध्ये सत्व,रज,तम वगैरे गुण आणि प्रवृत्ती, वर्ण, आश्रम वगैरे सांगून त्यानुसार आपापला धर्म ओळखून तसे वागावे वगैरे सांगून झाल्यानंतर शेवटी अठराव्या अध्यायात "सर्वधर्मान् परित्यज्य मामेकम् शरणम् भज। अहं त्वाम् सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः॥" असे सांगून भगवंताने सांगता केली आहे. परमेश्वराला शरण गेल्यानंतर तो माणसाला त्याला सर्व पापांमधून मुक्त करतो असे आश्वासन दिले आहे. गंमत म्हणजे बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन आणि इस्लाम या सगळ्या धर्मांमध्ये अशाच प्रकारची वचने आहेत.

हा लेख लिहिण्यासाठी मी गूगलवर थोडीशी शोधाशोध करून काही माहिती मिळवून ती इथे दिली आहे. ती मला पूर्णपणे समजली किंवा पटली आहे असे माझे म्हणणे नाही.

(समाप्त)


Monday, March 06, 2023

तत्वज्ञानाची ओळख


मी आयुष्यभर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम केले असल्यामुळे ते माझे आवडते विषय आहेत. विज्ञानावर मी लिहिलेले काही लेख या ब्लॉगवर एकत्र केले आहेत. ज्ञान, विज्ञान, सायन्स आणि नॉलेज https://anandghan.blogspot.com/2021/05/blog-post.html.

अलीकडच्या काळात मी अध्यात्म या विषयाची ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला होता त्याबद्दल इथे लिहिले आहे.  अध्यात्माची ओळख https://anandghan.blogspot.com/2022/11/blog-post_27.html 

यासाठी वाचन करत असतांना  माझ्या असे लक्षात आले की ज्ञान, विज्ञान, अज्ञान, तत्वज्ञान वगैरे शब्दांचे जे अर्थ मी इतके दिवस समजत होतो  त्यापेक्षा त्या शब्दांचे मुळातले संस्कृत भाषेत अभिप्रेत असलेले अर्थ काहीसे वेगळे असतात. कदाचित सर्वांना माहीत असेल किंवा नसेल, पण मराठी भाषेतला पहिला शब्दकोष जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि थॉमस कँडी या दोन इंग्रजांनी दीर्घकाळ प्रचंड मेहनत घेऊन तयार केला. श्री.दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मराठी भाषेचे व्याकरण तयार केले, इंग्रजीमधली काही विरामचिन्हे मराठीत आणली  आणि मराठीच्या नव्या प्रमाणभाषेची सुरुवात झाली. पूर्वी सगळे संत आणि पंत कवी आपल्या रचना पद्यामध्ये करत असत. गद्यलेखन त्या मानाने अलीकडच्या काळात सुरू झाले. बहुधा त्याच सुमाराला मुद्रणकला भारतात आली, छापखाने निघाले आणि पुस्तके छापली जाऊ लागली.  त्याच काळात इंग्रजीमधील  Knowledge, Science, Ignorance आणि Philosophy या शब्दांना ज्ञान, विज्ञान, अज्ञान आणि तत्वज्ञान हे मराठी प्रतिशब्द दिले गेले. बहुतेक मराठी लेखकांनी इंग्रजी साहित्याचाही अभ्यास केला होता आणि त्यांच्या लेखनावर इंग्रजी पुस्तकांमधील विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे या शब्दांचे इंग्रजी भाषेतले मूळ अर्थ या मराठी शब्दांना येऊन चिकटले आणि रूढ झाले. निदान मी तरी, आतापर्यंत हे मराठी शब्द त्या इंग्रजी अर्थांनी वापरत आलो आहे.

पण गीता, भागवत यासारख्या धार्मिक ग्रंथांमध्ये हे संस्कृत शब्द वेगळ्या अर्थांनी योजले असावेत असे वाटते. कुठल्याही विषयाचे नॉलेज म्हणजे त्याचे ज्ञान असे आपल्याला वाटते. आपण अनेक विषयांची माहिती शाळाकॉलेजात किंवा घरातल्या मोठ्या लोकांकडून शिकतो, पुस्तके वाचून किंवा आजकाल इंटरनेटवरून माहिती मिळते, त्यातले जेवढे समजते, लक्षात राहते त्याला आपण ज्ञान समजतो. असे जे ज्ञान आपल्या आजूबाजूच्या खूप लोकांना असते त्याला आपण सामान्यज्ञान म्हणतो. ज्या लोकांकडे निरनिराळ्या विषयातल्या माहितीचे भांडार असते त्यांना नॉलेजेबल समजले जाते, पण ज्ञानी आणि नॉलेजेबलमध्ये फरक आहे. ज्ञानी हा शब्द बहुतेक वेळा साधू, संत, स्वामी अशा साक्षात्कार झालेल्या लोकांसाठी वापरला जातो. 

अर्जुन एका प्रख्यात राजघराण्यात जन्मला होता, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर यासारख्या मोठ्या विद्वान गुरूंकडे धनुर्विद्या, नीतीशास्त्र वगैरे शिकला होता, तरीही गीतोपदेश मिळेपर्यंत तो अज्ञानातच राहिला होता. भगवंताकडून त्याला ज्ञान मिळाले. हे पाहता ज्ञान या शब्दाचा आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान वगैरे असा वेगळा अर्थ लक्षात येतो. हे ज्ञान सरसकट सर्व लोकांना कुणाक़डून शिकून किंवा पुस्तके वाचून समजेल असे नाही. पुराणकाळातले ऋषीमुनी एकटेच अरण्यात जाऊन कठोर तपश्चर्या करत असत आणि त्यांना ज्ञान प्राप्त होत असे, काही लोकांनी पूर्वजन्मी तपश्चर्या करून प्राप्त केलेले ज्ञान  त्यांना  जन्मतःच मिळते असे म्हणतात, तर काही लोकांना योग्य गुरु भेटला तर तो ज्ञानाचा मार्ग दाखवतो. पुराणातल्या कथांमधले ऋषीमुनी ध्यान धरून बसले की त्यांना कुणीही न सांगता अनेक गोष्टी अंतर्ज्ञानाने समजत असत. त्रिकालज्ञानी मुनींना तर भूतकाळात घडून गेलेल्या, वर्तमानकाळात कुठेही घडत असलेल्या आणि भविष्यकाळात कुठे तरी घडणार असलेल्या गोष्टी, इतकेच नव्हे तर कुणाच्या अनेक पूर्वजन्मांमधले तर कुणाच्या भविष्यातल्या जन्मातले प्रसंगसुद्धा आपोआप समजत असत असे म्हणतात. अशा अविश्वसनीय गोष्टी मी शिकलेल्या विज्ञानामध्ये म्हणजे सायन्समध्ये  बसत नाहीत, पण संस्कृतमधल्या ज्ञानविज्ञानात कदाचित ते ही शक्य असावे असे वाटते.

तत्वज्ञान असा शब्द प्राचीन काळातील संस्कृत भाषेत प्रचलित होता की नाही हे मला माहीत नाही. मी जे काही थोडे संस्कृत श्लोक वगैरे वाचले आहेत त्यात मला तत्वज्ञान हा शब्द दिसला नाही. कदाचित तो मराठीतच प्रचलित झाला असेल. हिंदी भाषेत फिलॉसॉफीला दर्शन असे म्हणतात. तत्व या शब्दातला त्व हा प्रत्यय महत्व, अस्तित्व वगैरे सारखा धरला तर तत्व याचा अर्थ तत् चे असणे असा होतो. तत् म्हणजे ते. मी आणि तू सोडून ती, तो वगैरे इतर सगळे जे काही या जगात किंवा कल्पनेतही असेल ते सगळे यात आले. इंग्लिशमधल्या  principle या अर्थानेही ‌तत्व हा शब्द मराठीत वापरला जातो. हे सगळे काय आहे, कशासाठी आहे वगैरेचे ज्ञान, तत्वांचे किंवा पदार्थांचे यथार्थ स्वरूप किंवा त्याचे सार म्हणजे तत्वज्ञान. या अर्थाने तत्वज्ञान हा शब्द फिलॉसॉफीच्या जवळ येतो. पण सर्व अर्थांनी समान वाटत नाही. वेद, उपनिषद, भगवद्गीता वगैरेंमध्ये असे सांगितले आहे की या विश्वात जे काही आहे ते सगळे परब्रह्म आहे. त्यामुळे  तत्वज्ञान म्हणजेच 'त्या'चे ज्ञान याचा अर्थ ब्रह्मज्ञान असाच अर्थ शास्त्रीपंडितांकडून घेतला जातो. हिंदू तत्वज्ञान अशा प्रकारे हिंदू धर्माशी जोडले गेले आहे.

फिलॉसॉफी हा शब्द फिलिओ (प्रेम) आणि सोफिया (ज्ञान) या दोन ग्रीक शब्दांपासून तयार झाला आहे. ज्ञानाचे प्रेम असा त्याचा साधारणपणे अर्थ निघतो.  सॉक्रेटिस, प्लेटो, अॅरिस्टॉटल वगैरे ग्रीक विचारवंत त्यांच्या काळातले अत्यंत बुद्धिमान तसेच ज्ञानी विद्वान होते. त्यांनी निरनिराळ्या विषयांवर मांडलेले सिद्धांत, विचार, मते वगैरे गोष्टी फिलॉसॉफीमध्ये गणल्या जाऊ लागल्या आणि आजही फिलॉसॉफी या विषयात त्या शिकवल्या जातात.  हे लोक येशू ख्रिस्ताच्याही आधीच्या काळात होऊन गेले होते. नंतरच्या दोन हजारवर्षांमध्ये तर युरोपात कित्येक महान फिलॉसॉफर्स होऊन गेले. माणसाला ज्ञान संपादन करण्याची निरनिराळी साधने मिळालेली आहेत. आपली पाच ज्ञानेंद्रिये मुख्य आहेत. आजूबाजूला दिसत असलेल्या गोष्टी किंवा घडत असलेल्या घटना पाहून त्यावरून बोध घेतला जातो हा पहिला राजमार्ग, पण कधीकधी दिसते तसे नसते, दिसलेले दृष्य एकादे प्रतिबिंब, मृगजळ किंवा भास असू शकते, यामुळे ते पू्र्णपणे विश्वासार्ह नसते, कानाने ऐकलेलेही खोटे असू शकते, त्यामुळे चुका होऊ शकतात. म्हणून आपल्या बुद्धीचा उपयोग करून काय बरोबर आहे हे तर्काने ठरवणे हा एक श्रेयस्कर मार्ग आहे असा दुसरा विचार आहे. शिवाय माणसाच्या मनात काय चालते, माणसे कशी वागतात, सत्य आणि असत्य, नीती आणि अनीती, न्याय आणि अन्याय अशा अनेक प्रकारच्या गोष्टी फिलॉसॉफीमध्ये येतात. मी कोण आहे आणि हे जग म्हणजे काय आहे, माझ्या आणि या जगाच्या अस्तित्वाचे काय कारण आहे असे प्रश्न सामान्य लोकांना पडत नसतील, पण तत्वज्ञांना ते रात्रंदिवस छळत असतील आणि आपापल्या मतीने ते लोक या प्रश्नांची समर्पक उत्तरे शोधत राहिले होते. 

या प्रकारच्या तत्वज्ञानात आत्मा, परमात्मा वगैरे आणण्याची तितकीशी गरज नसते.  पण हिंदू, ख्रिश्चन, इस्लाम, बौद्ध, जैन वगैरे सगळ्याच मुख्य धर्मांमध्ये या प्रश्नावर विचार करणारे धर्मगुरू होऊन गेल्यामुळे या धर्मांमध्ये त्यांच्या तत्वज्ञानाला महत्वाचे स्थान आहे. पण ख्रिश्चन धर्माशी  संबंधित असलेले किंवा नसलेले अशा युरोपमधील प्राचीन काळातील सगळ्याच मान्यवर विद्वानांनी सांगितलेले सगळे विचार, मते, तर्क, सिद्धांत, नियम वगैरे ज्ञान फिलॉसॉफीमध्ये येत गेले. नंतरच्या काळात त्यामधील नॅचरल फिलॉसॉफीला सायन्स असे वेगळे नाव  दिले गेले.  

भारतामधले तत्वज्ञान युरोपपेक्षाही काही हजार वर्षांनी पुरातन आहे. त्याची सुरुवात वेद आणि उपनिषदांपासून होते. अहम् ब्रह्मास्मि, तत्वमसि अशासारख्या सूत्रांमध्ये गहन अर्थ भरलेला आहे. पौराणिक काळातील ऋषीमुनी आणि इतिहासकाळातील आचार्यांनी  त्यांचे सखोल विश्लेषण करून त्यात भर घातली आहे. यामध्ये आस्तिक आणि नास्तिक अशा दोन मुख्य विचारसरणी आहेत. आस्तिक विचारसरणींमध्ये  वेदांत, सांख्य, योग, न्याय, मीमांसा, वैशेषिक अशी सहा दर्शने आहेत. त्यातून पुढे द्वैत, अद्वैत, विशिष्ट अद्वैत वगैरे प्रवाह किंवा उपप्रवाह आले आहेत. प्राचीन काळामधले विद्वान किंवा आचार्य या मतांवरून शास्त्रार्थांचा वादविवाद करत असत. वादे वादे जायते तत्वबोधः असे सुभाषित आहे. देवीच्या आरतीमध्ये "साही विवाद करता पडिले प्रवाही" या ओळीत सहा दर्शनांचा उल्लेख आहे. नास्तिक विचारसरणीमध्ये चार्वाक, बौद्ध आणि जैन ही प्रमुख तत्वज्ञाने येतात. या दोन्ही प्रकारच्या विचारसरणीमधील प्रत्येक दर्शनामध्ये अनेक तत्वे, तर्क, सिद्धांत आणि उदाहरणे दिली आहेत.  

या सगळ्यांचा विस्तार खूप मोठा आहे. मला याबद्दल काहीच माहिती नव्हती.  तत्वज्ञान या विषयाची उत्सुकतेपोटी जेवढी ओळख झाली ती थोडक्यात दिली आहे.

Thursday, January 19, 2023

तेथे कर माझे जुळती - २१ डॉ.अच्युत शंकर आपटे


माझ्या आयुष्यात मला भेटलेल्या ज्या थोर लोकांनी माझ्या मनावर खोलवर छाप सोडली आहे अशा वीस खास लोकांच्या आठवणी मी या मालिकेत सादर केल्या होत्या. याला अपवाद म्हणून मी या लेखात एका अशा व्यक्तीबद्दल लिहिणार आहे, जिला भेटण्याची मला लहानपणापासून खूप इच्छा होती, पण तसा योगच आला नाही.  मी त्यासाठी फारसे प्रयत्नही केले नाहीत हेही तितकेच खरे आहे.

मी जमखंडी इथे शाळेत शिकत असतांना शाळेमधले मास्तर लोक आमच्यापुढे गुरुदेव रामभाऊ रानडे यांचा आदर्श ठेवत असत, पण त्या ऋषितुल्य साधुसंताचा थोरपणा त्या  लहान वयात आमच्या आकलनाच्या पलीकडचा होता. त्यामुळे आपण मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे सद्गुरु व्हावे, आश्रमात रहावे, आपला शिष्यपरिवार असावा वगैरे मला  चुकूनही कधी वाटले नाही. त्याच काळात आमच्या घरातली वडीलधारी मंडळी डॉ.अच्युतराव आपटे यांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर ठेवत असत. त्यांनी नेमके काय काय पराक्रम केले हे कदाचित त्यांनाही माहीत नसेल, पण ते खूप हुषार होते आणि आपल्या हुषारीच्या जोरावर ते परदेशी जाऊन काहीतरी भव्यदिव्य असे उच्च शिक्षण घेऊन आले होते एवढी माहितीही त्या काळात खूप आकर्षक होती. आजकाल दर दोन तीन मुलांमधला एक तरी परदेशात जात येत असतो, त्यामुळे कुणाला त्याचे फारसे कौतुक वाटत नाही. पण माझ्या लहानपणी परदेशी जाणे ही अशक्यप्राय इतकी भारी गोष्ट वाटायची.  लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू वगैरे मोठमोठी पुढारी मंडळी परदेशी जाऊन आले होते हे मला माहीत होते, पण आमच्या माहितीत तरी अशी कोणती ओळखीतली व्यक्ती नव्हती.

अच्युतराव आपटे आमच्या गावातच जन्मलेले आणि आमच्या शाळेतच शिकलेले होते. ते माझ्या आत्याच्या नात्यात होते आणि त्यांचे घरही आत्याच्या घराला लागूनच होते, त्यामुळे आम्हाला जातायेतांना ते घर दिसत असे. कदाचित माझ्या लहानपणी ते तिथे अधूनमधून येतही असतील, पण त्याच काळात त्यांच्या घरी जायची संधी मला कधीच मिळाली नाही. ते वयाने माझ्याहून खूप मोठे असल्यामुळे  आमची ओळख होण्याची काही शक्यताही नव्हती. त्यांनी माझे नावसुद्धा कधी ऐकले नसेल. पण माझी आई आणि आत्या यांच्या बोलण्यात अच्युतरावांच्या कर्तृत्वाचा गौरवपूर्ण उल्लेख नेहमी येत असे, त्यामुळे  माझ्या मनात या व्यक्तीसाठी एक खूप मोठे मानाचे स्थान तयार झाले होते. आपणही त्यांच्यासारखे मन लावून अभ्यास करून भरपूर शिकावे आणि स्कॉलरशिप मिळवून उच्च शिक्षणासाठी परदेशी जावे हे मला त्या वेळी शक्यतेच्या कोटीतले वाटत होते.  चांगले मार्क मिळवून मोठी डिग्री घेतली तर जाण्यायेण्याच्या खर्चाची सोय आपोआप होत असावी असेही तेंव्हा कदाचित वाटत असेल. पण कॉलेजात गेल्यानंतर पाहिले की ज्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचे होते त्यांना त्यासाठी खूप धडपड आणि खर्चही करावा लागतो, अगदी विद्यापीठात पहिला आलेल्या मुलाचीही त्यातून सुटका नसते, तेंव्हा मी तो नाद सोडून दिला. माझ्याच वर्गातली काही मुले आपापल्या प्रयत्नाने परदेशी गेलेली पाहिली आणि मलाही नोकरीतून परदेशी जायची संधी मिळणारच याची जवळ जवळ खात्री होती. त्यामुळे मला परदेशगमनाचे वाटणारे अप्रूप कमी झाले.

माझ्या नात्यातल्या एका मुलाची आर्थिक परिस्थिति बेताची होती. पण श्री.अच्युतराव आपटे यांनी त्याच्या पुण्यात राहण्याजेवण्याची आणि शिक्षणाची सोय लावून दिली असे ऐकले तेंव्हा मला समजले की ते उच्चशिक्षित विद्वान होते तसेच बरीच समाजसेवाही करत होते. पण त्या काळी मला त्याचा जास्त तपशील समजला नाही. आमच्या घरात माझी आई आणि आत्या सोडून इतर कुणी अच्युतरावांना ओळखतही नव्हते, त्यामुळे नंतर घरातल्या कुणाच्या बोलण्यातून त्यांचा उल्लेख येईनासा झाला. मराठी वर्तमानांमध्ये कधी विद्यार्थी सहाय्यक संघाविषयी काही माहिती किंवा बातमी आली तर त्यात अच्युतराव आपटे यांचा उल्लेख येत असे, पण ती बातमी कधी कधीच माझ्या वाचनात आली असेल.

पुण्यात राहणाऱ्या जमखंडीकरांचा एक समूह तयार झाला आणि मला त्यात प्रवेश मिळाला. त्या संपर्कातून मला अलीकडेच अच्युतरावांवरील दोन लेख वाचायला मिळाले. त्यातला एक प्रा.स.पां.देशपांडे यांनी विवेक साप्ताहिकाच्या महाराष्ट्र नायक या श्रुंखलेसाठी लिहिला आहे आणि दुसरा लेख उल्का कळसकर यांनी सकाळ वर्तमानपत्राच्या सप्तरंग पुरवणीसाठी लिहिला आहे. हे लेख वाचून आतापर्यंत मला नसलेली त्यांच्या कार्याविषयी बरीच माहिती मिळाली आणि अच्युतराव आपटे यांच्या विषयी माझ्या मनात लहानपणापासून असलेला आदर अनेकपटींनी वाढला. 'दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती' या कवितेप्रमाणे मी मनोमनी दोन्ही हात जोडून त्यांना  प्रणाम केला.

श्री.अच्युतराव आपटे यांनी १९४२ सालच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना कारावास घडला होता.  तुरुंगातून सुटल्यावर ते बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये गेले आणि डॉ. होमी भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मेसॉन फील्ड्स’ या भौतिकशास्त्रातल्या विषयावर संशोधन करू लागले. पुढे त्यांनी पीएच.डी. पदवी मिळवली. मात्र स्वतंत्र गणिती संशोधनास वाहून घेण्याची प्रज्ञा असताना, १९४९ सालापासून खडकवासला येथल्या भारत सरकारच्या केंद्रीय जलविद्युत संशोधन संस्थेच्या गणित विभागात संशोधन अधिकारीपदाची त्यांनी जी जबाबदारी स्वीकारली, ती १९७९ साली संगणक विभागप्रमुख म्हणून पायउतार होईतो, त्यांनी समर्थपणे निभावली. तीस वर्षांच्या या कार्यकाळात अनेक समाजोपयोगी समस्यांची उकल करण्यासाठी अथक प्रयत्न करून अच्युतरावांनी गणिती प्रतिकृतीच्या (मॅथेमॅटिकल मॉडेल्स) अनेकविध प्रणाली निर्माण केल्या. त्यांपैकी काही तर आव्हानात्मक होत्या. अशा गणिती प्रतिकृती विकसित करून संशोधनाच्या या क्षेत्रात त्यांनी केलेल्या प्रगतीचा भारत सरकारने गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.

 केंद्रीय जलविद्युत संशोधन संस्था (सीडब्ल्यूपीआरएस) हे मुख्यत्वे सिव्हिल इंजिनियरिंगचे संशोधन केंद्र आहे, पण डॉ.अच्युतराव आपटे यांनी तिथे गणितामधील  ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग करून गंगा, ब्रह्मपुत्रा वगैरे नद्यांमधील जलप्रवाहांच्या मोजमापांमधल्या किचकट समस्या सोडवल्या आणि महापुरांचे नियंत्रण व कोलकाता शहराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा असे महत्वाचे लोकोपयोगी प्रकल्प यशस्वी केले. कोयना धरणाच्या आसपास आलेल्या भूकंपाच्या धक्क्यांचे मूळ आलेख मिळवून त्यांचे विश्लेषण करण्यातही त्यांनी आपले कौशल्य दाखवले.

हे शास्त्रीय काम करत असतांनाच अच्युतराव समाजकार्याकडे वळले. ‘विद्यार्थी साहाय्यक समिती’, ‘इन्व्हेस्टमेन्ट इन मॅन’ आणि ‘फ्रेंच मित्र मंडळ’ ही त्यांची तीन सामाजिक अपत्ये. शिक्षणाची इच्छा असूनही गरिबीमुळे ग्रमीण भागातल्या असंख्य मुलांना शहरात राहण्या-जेवण्याच्या सोयीअभावी शिक्षण सोडावे लागते. हे जाणून १९५६ साली विद्यार्थी साहाय्यक समितीची स्थापना करून अच्युतरावांनी विद्यार्थ्यांची अल्पदरात ही सोय केली. उत्तम संस्कार, व्यक्तिविकासाबरोबर श्रमशक्तीची जाणीव करून देताना समितीच्या मनात ना उपकाराची भावना ना विद्यार्थ्यांच्या लेखी लाचारीची, असे वातावरण ठेवले.  अशाच प्रकारे मनुष्यबळातली गुंतवणूक (इन्व्हेस्टमेन्ट इन मॅन) ही दुसरी सामाजिक संस्था, पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागातील ग्रामीण परिसरात, फुगेवाडी येथे अच्युतरावांनी काढली. तेथे निराधार बालकांवर सुसंस्कार करण्यासाठी बालसदन, नरसी मोनजी तंत्रशाळा उभारण्याबरोबरच ग्रमीण भागातील तरुणांना शेती, दुग्धव्यवसाय, छपाई व इतर औद्योगिक व्यवसायांतले कसब आत्मसात करण्याचे प्रशिक्षण देण्याची ही व्यवस्था केली. त्यांतून अनेकांना रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध झाले. दोन्ही संस्थांत अच्युतराव निर्मळ वृत्तीने विश्वस्त राहून, संस्थांच्या विश्वासार्हतेला तडा जाणार नाही याबद्दल दक्ष असत. त्याशिवाय संत ज्ञानेश्वरमहाराजांनी दिलेल्या ‘हे विश्वचि माझे घर’ या संदेशानुसार सन १९६७ मध्ये त्यांनी ‘फ्रान्स मित्रमंडळ’ची स्थापना केली.  या मंडळातर्फे दरवर्षी काही काळ भारतीय नागरिक फ्रान्समध्ये, तर फ्रेंच नागरिक भारतामध्ये ठेवणे अशी आखणी होऊन आजवर हजारो नागरिकांना परस्परांच्या देशांतल्या समाजजीवनाचा परिचय झालेला आहे.

अच्युतरावांची राहणी महात्मा गांधीजींप्रमाणेच साधी होती. नीतितत्त्वांचं आचरण व सेवाभाव त्यांच्या ठायी होता. ग्रामीण भागाची, तिथल्या माणसांची दुःखं तळमळीनं जाणून घेणारा समाजसेवक अशीच अच्युतरावांची ओळख होती. अनाचार, भ्रष्टाचार आदी बाबींपासून ग्रामीण भागातला विद्यार्थी मुक्त असावा, त्याला राजकारणापेक्षा विद्याव्यासंगात आनंद मिळावा, त्यानं नीतीमूल्यं मानून आपला विकास करावा, अशी तळमळ अच्युतरावांना होती. त्यांना कुणी ‘समाजवादी विचारवंत’,  कुणी ‘गांधीवादी समाजसेवक’ म्हणत असत; परंतु ते ‘समतावादी समाजशिक्षक’ होते . सर्वांबद्दल प्रेम बाळगून व काही मूल्यं उराशी बाळगून विचार करणारे ते ‘आचारवंत’ होते.

असे हे आमच्या गावाचे भूषण असलेले डॉ.अच्युतराव आपटे होऊन गेले. त्यांचे कार्यक्षेत्र पुण्यात होते आणि ते पुण्याचेच रहिवासी होते, पण त्यांना भेटण्याचा योग जुळून आला नाही किंवा मी त्यासाठी काही विशेष प्रयत्न केले नाहीत याची खंत मनात राहील.

Sunday, November 27, 2022

अध्यात्माची ओळख

 अध्यात्म आणि मी  या मथळ्याखाली मी फेसबुकवर लिहिलेल्या स्फुट लेखांचे संकलन करून हा लेख तयार केला आहे. 

मी लहान असतांना 'अध्यात्म' आणि 'परमार्थ' हे शब्द कधी कधी घरातल्या मोठ्या लोकांच्या बोलण्यामधून कानावर पडत असत. या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच असावा आणि तो आत्मा, परमात्मा वगैरेशी संबंधित असावा अशी माझी समजूत झाली होती. तीही अगदीच चुकीची नव्हती. माणूस मरतो तेंव्हा त्याचा आत्मा शरीरातून बाहेर निघून जातो आणि तो स्वर्गात किंवा नरकात जातो किंवा दुसऱ्या एकाद्या बाळाच्या किंवा कुठल्याशा इतर प्राण्याच्या पिल्लाच्या शरीरात शिरतो असे ऐकले होते. काही अतृप्त आत्मे मात्र भूतपिशाच्च होऊन इथेच दीर्घकाळ सतत त्रास देत रहातात असेही मी त्या काळात ऐकले होते आणि मनातून त्यांची भीतीही वाटत होती. पण हा आत्मा जीवंत माणसाच्या शरीरात रहात असतांना तिथे काय काम करतो याची मात्र मला तेंव्हाही फारशी  माहिती नव्हती. सत्तर वर्षांपूर्वीच्या काळात अशी परिस्थिती होती की कदाचित मला हा प्रश्न कधी पडलाच नसेल आणि पडला असलाच तरी तो मोठ्या लोकांना विचारायचे धाडस मी करू शकलो नसेन.  लहान मुलांनाही आत्मे असतात असे त्या काळातल्या वडीलधारी लोकांना बहुधा वाटतच नसावे. सदान् कदा त्यांच्या अंगावर ओरडून आणि चांगला मार देऊन मुलांना नेहमी धाकातच ठेवले जात असे. त्यांची तोंड वर करून काही बोलायची प्राज्ञा नव्हती, मग प्रश्न कसले विचारणार? त्यामुळे अध्यात्म हे माझ्यासाठी एक प्रकारचे गूढ होते, पण ते समजून घेण्याचीही त्या वेळी मला काडीचीही गरज वाटत नव्हती. गुरुवारी दत्ताची आरती करणे, शनिवारी मारुतीच्या देवळात जाऊन नारळ फोडणे आणि एकादशीला साबूदाण्याची खिचडी खाणे हेसुद्धा अध्यात्मात येत असावे अशीही माझी (गैर)समजूत झाली होती.

कॉलेजमध्ये गेल्यानंतरच्या काळात मी ज्या प्रकारची पुस्तके आणि लेख वाचले, नाटके आणि सिनेमे पाहिले त्यावरून माझी अशी खात्री पटत गेली की कुणीही एकाद्या आत्म्याला जाता येतांना किंवा काही उद्योग करतांना कधीच पाहिलेले नाही, ती एक फक्त कल्पना आहे, वाटल्यास एक संकल्पना आहे. ती समजून घेण्यावाचून त्यावेळी तरी माझे काही अडत नव्हते. त्यामुळे मी अध्यात्म हा विषयच बाजूला ठेवला. माझ्या अभ्यासात आणि नंतर कामात मी इतका गुंतत गेलो की तो विषय पन्नास वर्षे तसा बाजूलाच राहिला. या काळात मी ज्या वातावरणात रहात होतो, तिथे आजूबाजूचे लोक देवदर्शन, पूजा, आरती वगैरे गोष्टी माफक प्रमाणात करत होते आणि मीसुद्धा आपण होऊन त्यात हौसेने सहभागी होत होतो. मी त्यांना कधी विरोध केला नाही. माझाही असलाच तर तेवढ्यापुरता 'अध्यात्मा'शी संबंध टिकून राहिला होता.

. . .

या विश्वातल्या अणुरेणूंनाही (Aoms and Molecules) कुणीही कधीही डोळ्यांनी पाहिलेले नाही किंवा नाककान यासारख्याआपल्या ज्ञानेंद्रियांकडूनही इतर कुठल्याही प्रकारे आपल्याला त्यांचे अस्तित्व जाणवत नाही, पण ते प्रत्येक पदार्थात असतातच असे काही शास्त्रज्ञांनी तर्काच्या आधाराने सांगितले, तसेच त्यांचे काही संभाव्य गुणधर्मही सांगितले. ते मान्य केले तर त्या काळातल्या विज्ञानापुढे असलेल्या अनेक प्रश्नांची तर्कशुद्ध उत्तरे मिळत होती म्हणून बाकीच्या शास्त्रज्ञांनी त्यांना मान्यता दिली आणि त्यांच्या आधारावर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात पुढील काळात अनेक शोध लागत गेले, तसेच तंत्रज्ञानात भर पडत गेली. पुढच्या काळातल्या शास्त्रज्ञांनी अणूच्या अंतर्गत रचनेची कल्पनाचित्रे (मॉडेल्स) तयार करून त्यांच्यापेक्षाही सूक्ष्म अशा कणांचे कल्पनेतूनच शोध लावले. न्यूट्रॉन नावाचे एरवी निष्क्रिय असलेले कण खवळले तर प्रचंड मोठा स्फोट घडवतात हे त्यांनी नुसते तर्कानेच सांगितले नाही तर प्रत्यक्षात तसे स्फोट घडवून दाखवले. मग निसर्गामधून अशा प्रकाराने मिळणाऱ्या ऊर्जेचा शांतताप्रिय कामात उपयोग करणेही सुरू झाले. अणुशक्तीपासून विजेची निर्मिती करण्याच्या क्षेत्रात मी आयुष्यभर काम केले. त्यामुळे अणुरेणूंना मी कधी पाहिले नसले तरी त्यांच्या अस्तित्वाबद्दल माझ्या मनात कधीच शंका आली नाही.

सेवानिवृत्तीनंतर माझा विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी असलेला संबंध कमी होत गेला. याच काळात आंतरजालाचा प्रसार अकल्पनीय वेगाने वाढत गेला आणि आपल्याला हवे ते जगभरातले ज्ञान घरबसल्या प्राप्त करता येणे शक्य झाले. हजारो वर्षापूर्वी होऊन गेलेले महर्षी व्यास, वाल्मिकी, शेकडो वर्षांपूर्वीचे आदि शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर आणि समर्थ रामदासस्वामी यांनी तेंव्हा काय लिहून ठेवले होते यांचे आजच्या काळातल्या विद्वानांनी सोप्या शब्दांमध्ये सांगितलेले सार वाचणे मला आता शक्य झाले.  त्यांनी केलेले निरूपण मला कुठल्याही देवळात किंवा सभागृहात न जाता माझ्या सवडीनुसार घरबसल्या किंवा पडल्यापडल्यासुद्धा ऐकता येणे शक्य झाले.  तेंव्हा माझ्या मनात असा विचार आला की शास्त्रज्ञांनी सांगितले म्हणून मी जसा अणुरेणूंवर विश्वास ठेवला होता आणि त्यामुळे मला विज्ञान समजायला मदत झाली होती, त्याचप्रमाणे या विद्वानांनी सांगितल्याप्रमाणे आत्मा ही संकल्पना मान्य केली तर कदाचित अध्यात्म या बाजूला ठेवलेल्या विषयाशी निदान तोंडओळख तरी होईल. माझ्या पिढीतल्या इतर काही लोकांना त्याची गोडी का वाटते ते समजेल.

. . .

ईमेल, फेसबुक, वॉट्सॅप वगैरेंमुळे आपला संदेश जगभरात कुठेही असलेल्या एका किंवा अनेक व्यक्तींना  क्षणार्धात आणि फुकटात पाठवणे शक्य झाले, एवढेच नव्हे तर त्या संदेशात अक्षरे, चित्रे आणि ध्वनिसुद्धा पाठवता यायला लागले. यामुळे आज अनेक जुनी तसेच नवी माणसे माझ्या संपर्कक्षेत्रात आली आहेत. त्यात माझे जवळचे आणि दूरचे नातेवाईक, शाळेतले, कॉलेजातले, नोकरीतले आणि कॉलनीमधले मित्र असे निरनिराळ्या प्रकारचे आणि भिन्न वयोगटातले लोक आहेत. रोज कमीतकमी दोनअडीचशे तरी संदेश माझ्या सेलफोनवर येऊन पोचत असतात. त्यातले ९०-९५ टक्के केवळ मौजमजा आणि टाइमपाससाठी असले तरी ५-१० टक्के संदेश 'वाचा आणि विचार करा' या प्रकारचेही असतात. यातल्या चारपाच मित्रांनी भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध यासारख्या ग्रंथांची पारायणे केली आहेत, दोन तीन जणांनी कुठल्या कुठल्या ज्ञानयज्ञांना हजेरी लावली आहे आणि एकदोघांनी तर चक्क आध्यात्मिक गुरू शोधून त्यांचे शिष्यत्व पत्करले आहे. आपल्या इतर अज्ञानी मित्रांचाही उद्धार व्हावा या पवित्र हेतूने यातले काहीजण अधूनमधून चमचाभर ज्ञानामृत आपल्या संदेशात टाकत असतात. ते प्राशन करून त्यातले काही कण माझ्या मेंदूपर्यंत पोचले असावेत. तेवढ्या आधारावर मी हा लेख लिहीत आहे.   

"तुला तुझ्या स्वतःच्या आत्म्याची जाणीव झाली आहे का?" असे मी एका जवळच्या आध्यात्मिक मित्राला सरळ विचारले होते. त्यावर त्याने उत्तर दिले की आता कुठे त्याची त्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. जेंव्हा त्याची पात्रता पुरेशी वाढली आहे असे त्याच्या सद्गुरूंना वाटेल त्या वेळी ते तेवढी कृपा करतील. त्यांच्या सहाय्याशिवाय आपल्या आपणच आपल्या आत्म्याला शोधता येणे शक्य नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर हा अध्यात्माचा ज्ञानमार्ग फार बिकट दिसतो. त्यासाठी आधी ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा असा  एक खरोखर चांगला गुरु मिळायला पाहिजे आणि त्याने तुम्हाला शिष्य म्हणून स्वीकारायला हवे. ते तर मला या जन्मात जमेल असे वाटत नाही. कारण विज्ञानाच्या मार्गाने जातांना मला जास्तच चिकीत्सक वृत्ती मिळाली आहे.  त्या मानाने भक्तीमार्ग सोपा असावा. आपल्याला स्वप्नात किंवा ध्यान धरलेले असतांना अमक्या तमक्या देवाने किंवा देवीने दर्शन दिले आणि काहीतरी करायला सांगितले असे दृष्टांत किंवा प्रचीतीचे दाखले मी लहानपणापासून अनेक लोकांकडून ऐकले आहेत. ते सांगतांना त्यांना इतके आनंदाचे भरते आलेले असते की त्यावर शंका व्यक्त करून विरजण घालावे असे मला वाटत नाही.  

. . .

बाबा, स्वामी, कीर्तनकार, प्रवचनकार वगैरे लोकांना विज्ञानाचे वावडे असावे असे वाटते. हे लोक विज्ञानामधील प्रगतीमुळे उपलब्ध झालेल्या सगळ्या सुविधांचा लाभ तर घेत असतात, पण "या विज्ञानाला हे तरी समजले आहे का?" आणि "ते तरी कुठे जमते ?" वगैरे ताशेरे मारून त्याची टिंगल करत असतात आणि बहुतेक सगळे भाबडे श्रोते त्यांना दाद देत असतात. "यांचे विज्ञान जिथे संपते तिथे आमचे अध्यात्म सुरू होते" हे त्यांचे एक आवडते वाक्य आहे. इतर सर्वसामान्य आणि काही चांगले शिकलेसवरलेले लोकसुद्धा हे वाक्य अधूनमधून ऐकवत असतात. यावरून कुणाला असे वाटेल की विज्ञानाला न सोडवता आलेले गहन प्रश्न अध्यात्मामधून चुटकीने सोडवता येत असतील. पण तसे एकादेही उदाहरण माझ्या तरी ऐकिवात किंवा पाहण्यात नाही.

मात्र अध्यात्म हे विज्ञानाच्या पलीकडे आहे हे विधान तसे पाहता बरोबरच आहे, कारण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (Physics, Chemistry, Biology)  यामधून झालेल्या संशोधनातून आत्मा अस्तित्वात असल्याचा कसलाही पुरावा अजूनपर्यंत सापडलेला नाही आणि यातल्या कुठल्याही विषयात  त्याचे गुणधर्म शिकवले जात नाहीत. म्हणजे  आत्मा ही संकल्पना विज्ञानाच्या बाहेर किंवा पलीकडे तर आहेच आणि अध्यात्म हे ज्ञान आत्मा, परमात्मा वगैरेंशी संबद्धित असल्यामुळे ते विज्ञानात येत नाही. मात्र आचार्य प्रशांत या एका आधुनिक बाबाने आपल्या एका व्हीडिओमध्ये असे सांगितले आहे की सगळे विज्ञानच अध्यात्मात समाविष्ट आहे. विज्ञान हा अध्यात्माचा एक सबसेट आहे. या विधानानुसार अध्यात्म हे आपोआपच विज्ञानाहून मोठे ठरते.

. . .  

अधि + आत्म मिळून अध्यात्म हा शब्द तयार होतो. अधिकार, अधिकृत, अधिपति, अधिवेशन, अधिष्ठान वगैरे शब्द पाहिल्यास अधि या उपसर्गाचा नेमका काय अर्थ असेल ते समजत नाही. 'आत्म्याविषयीचे ज्ञान' असा अध्यात्म या शब्दाचा एक सोपा  अर्थ सोयिस्कररीत्या केला जातो. "मी कोण आहे ? कुठून आलो ? कशासाठी आलो ?" अशासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणजे अध्यात्म असेही समजले जाते. "मी अमुक तमुक, मुंबईहून काही कामासाठी पुण्याला आलो आहे." असली उत्तरे इथे म्हणजे अध्यात्मात चालत नाहीत. ती या देहाला लागू पडतात, पण मी म्हणजे माझा हा नश्वर देह नव्हे. अंतर्मुख होऊन " खरोखर मी कोण आहे?" याचा शोध घेणे म्हणजे अध्यात्म. असे सांगतात. पण हे अंतर्मुख कसे व्हायचे असते तेच मला तरी अजून समजलेले नाही.

"मला आनंद होतो, मला वाईट वाटते, मला आश्चर्य, भीती, काळजी वगैरे वाटते, मला आवडते, मला पटते, मी शहाणा आहे, मी प्रेमळ आहे, वगैरे वगैरे... " असे जेंव्हा आपण म्हणतो तेंव्हा यातला मी नेमका कोण असतो? शरीराच्या आत राहणाऱ्या या अदृष्य 'मी'साठी मन, बुद्धी, अहंकार (मीपण)आणि चित्त असे चार शब्द दिले आहेत, त्यांच्या संकल्पनांमधील सीमारेषा अस्पष्ट आहेत. पण मी यातलाही कुणीच नव्हे असे जगद्गुरु शंकराचार्य त्यांच्या प्रसिद्ध निर्वाणषटकात सांगतात. ("मनोबुद्ध्यहंकारचित्तानि नाहम्।")  पुढे जाऊन मी तर  चिदानंदरूपी शिव आहे, थोडक्यात  सांगायचे झाल्यास मी परमेश्वरच आहे असे ते या स्तोत्रात म्हणतात. पण सगळे जण असे समजायला लागले तर जगात केवढा गोंधळ होईल? मुख्य म्हणजे मी असे म्हंटले तर लोक ते मान्य करणार आहेत का ? असे नुसते म्हंटल्याने मी परमेश्वर होणार आहे का? पण तसे स्वतःला खरोखर वाटणे म्हणजे निर्वाण, कैवल्य वगैरे असे अध्यात्म सांगते म्हणे.

. . .

मी स्वतः कोणा आध्यात्मिक गुरूला शरण गेलेलो नाही. त्यामुळे गूगलबाबालाच अध्यात्माबद्दल विचारले. तर त्याने अर्ध्या सेकंदात १,२८,००,००० इतके रिझल्ट दाखवले. यावरून असे दिसते की अध्यात्मावर काहीतरी लिहिणारेही लक्षावधी लोक या आंतर्जालावर नेहमी संचार करत असतात. अध्यात्माबद्दलचे ब्लॉग आणि व्हीडिओ सुद्धा विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. मी पहिल्या ४०-५० संदर्भांची फक्त शीर्षके वाचली. त्यावरून असे दिसते की अध्यात्म या शब्दाखाली अनंत गोष्टी येतात. आत्मा आणि परमात्मा तर आहेतच, पण मानवता, नैतिकता, दया, करुणा, अहिंसा, प्रामाणिकपणा, निरपेक्ष कर्म करणे, मनःशांति, रागावर नियंत्रण ठेवणे अशा गोष्टीसुद्धा त्यात येतात. 'जे जे उत्तम उदात्त सुंदर, महन्मधुर ते ते' असे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतंत्रतेबद्दल जे लिहिले आहे ते अध्यात्माच्या कक्षेतही येते असे दिसते. 

कोणी म्हणतो अध्यात्म आणि धर्म या वेगळ्या गोष्टी आहेत, पण हिंदू, बौद्ध, जैन, शीख आदि भारतीय धर्म किंवा पंथ सोडून इतर कुठल्या धर्मांमध्ये अध्यात्माचा उल्लेख येत नाही आणि या भारतीय धर्मांबद्दल बोलणारे गुरु अध्यात्माच्या गोष्टी करत असतात असे मला वाटते. रिलिजन या शब्दाला धर्म हा प्रतिशब्द वापरला जात असला तरी त्या दोन्हीमध्ये फरक आहेच. तो लक्षात घेतला तर देवाची उपासनापद्धति या अर्थाचा अध्यात्माशी तसा थेट संबंध नाही, पण भाविक लोक मात्र आपल्या भजनपूजनाला अध्यात्म समजतात हे मी लहानपणापासून पहात आलो आहे. काही लोक अध्यात्माचा संबंध योगाशी जोडतात. योग या शब्दाचा अर्थच बहुधा परमेश्वराशी जुळणे असा आहे, पण आपण तो एक फक्त व्यायामाचा प्रकार समजतो. बाह्य गोष्टींपासून मिळणाऱ्या तात्कालिक किंवा खोट्या आनंदाऐवजी चिरकाल टिकणारा खरा आनंद प्राप्त करणे हे अध्यात्माचे उद्दिष्ट आहे यावर मात्र बहुतेक लोकांचे एकमत दिसते. 

. . .

अध्यात्म या विषयावर जे काही सांगितले किंवा लिहिले जाते त्यात काही गोष्टी गृहीत धरलेल्या असतात.

१. आत्मा अमर आहे आणि तो एका शरीरातून निघून दुसऱ्या शरीरात जात असतो, पण तो आपल्या आधीच्या आणि या जन्मात केलेल्या कर्मांचे गाठोडे सोबत घेऊन पुढे जातो.

२. माणसाने केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्मांची फळे त्याला याच किंवा पुढे येणाऱ्या कुठल्या ना कुठल्या जन्मात मिळतातच, किंवा स्वर्गात किंवा नरकात काही काळ राहून ती भोगावी लागतात.

३. माणसाचे बहुतांश जीवन दुःखाने भरलेले आहे. इतर प्राण्यांचे हाल तर विचारायलाच नको.

४. ते दुःख टाळण्यासाठी आणि कायम टिकणारा आनंद मिळवण्यासाठी या जन्ममरणाच्या चक्रातून बाहेर पडणे हे मनुष्यजन्माचे ध्येय असायला हवे. 

५. आपल्या पापपुण्याची फळे भोगून झाल्यावर ती पाटी कोरी होते तेंव्हा मोक्ष मिळतो. त्या वेळी आत्मा परमात्म्यात विलीन होतो. त्याचे वेगळे अस्तित्व शिल्लक रहात नाही.

क्रमांक ३ वर लिहिलेले निरीक्षण पूर्वीच्या काळात कदाचित पूर्णपणे बरोबर असेल. त्या काळातले लोक फार पापे करत होती का? आणि म्हणून ती सतत दुःखी रहात असतील का ? आजकाल माणसाचे जगणे हे बऱ्याच प्रमाणात सुखावह झाले आहे. "या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे", "आनंदीआनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे", "फुलला पहा सभोती आनंद जीवनाचा" अशी गाणी कवी लिहितात आणि ती लोकांना आवडतात. आजकाल वयोवृद्ध लोकसुद्धा जास्तीत जास्त आनंदात कसे रहाता येईल असा विचार करायला लागले आहेत. कदाचित त्यामुळे ते आजकाल अध्यात्माच्या वाटेने फारसे जात नाहीत. तान्ही बाळे किंवा मानसिक वाढ खुंटलेली मुले बहुतेक वेळा हसतमुख असतात. त्यांना पाहून असे वाटते की आनंदात राहणे ही मानवाची खरी मूळ अंतःप्रेरणा असावी. दुःखी राहणे ही नाही. इतर मुद्दे पडताळून पाहणे सर्वसामान्य माणसाला अशक्य आहे. आजकाल त्रिकालज्ञानी महापुरुष कुठे भेटत नाहीत. त्यामुळे मागच्या किंवा पुढच्या जन्माबद्दल किंवा मोक्षप्राप्तीबद्दल कोणीच काही ठामपणे सांगू शकत नाही आणि ते सिद्ध करू शकत नाही. एकाद्याला काही लाभ झाला तर ती त्याच्या पूर्वजन्मीची पुण्याई आणि फटका बसला तर ते कुठल्याशा पापाचे फळ असे जुन्या काळातले लोक नेहमी म्हणत असत. नव्या पिढीमधल्या लोकांच्या बोलण्यात अशी वाक्ये येत नाहीत.

. . .

 अध्यात्म हा विषय आत्म्याच्या संबंधात असला तरी त्यावरील चर्चा परमात्म्यापर्यंत जाऊन पोचतातच. हिंदू धर्मग्रंथांमधील थिअरीप्रमाणे या विश्वातील अणुरेणू आणि त्यांच्यामध्ये असलेली पोकळीसुद्धा निर्गुण निराकार अशा परमेश्वराने व्यापलेली आहे.  ज्या काळात या विश्वात काहीच नव्हते तेंव्हासुद्धा हा अनादि अनंत असा भगवंत होताच. त्याने ब्रह्म आणि माया किंवा पुरुष आणि प्रकृति अशी दोन रूपे घेतली. प्रकृति किंवा मायेने स्वतःमधूनच पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते निर्माण केली आणि त्यांना एकमेकांमध्ये मिसळून सगळे निर्जीव पदार्थ, तसेच सजीवांचे देह तयार केले आणि ते काम ती करतच राहिली आहे. परमेश्वरामधला 'पुरुष' सूक्ष्म अंशाने जीवात्म्याच्या रूपाने त्या देहांमध्ये प्रवेश करून त्यांना सचेतन करतो आणि तो माणूस चालायला, बोलायला, पहायला, ऐकायला, काम करायला लागतो. अखेर त्या जीवात्म्याने देहातून बाहेर पडल्यानंतर पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले आणि वाढलेले त्याचे शरीर काम करणे थांबवते आणि त्याचे विघटन होऊन ते पंचमहाभूतांमध्ये मिसळून जाते. पण तो जीवात्मा मात्र दुसऱ्या एका शरीरात शिरून त्या शरीराचा ताबा घेतो. असे होत राहते. काही पुण्यवान जीवात्मे यातून बाहेर पडून परमात्म्यात विलीन होतात. त्यांना मोक्ष मिळाला असे समजले जाते. 

इथे या विश्वाची निर्मिति आणि विनाश करणारा परमेश्वरच त्याच्या कणाकणात भरलेलाही आहे आणि त्याला चालवणारे चैतन्यही तोच आहे. म्हणजे निर्माता हा स्वतःच स्वतःची निर्मिति आहे आणि तिचा चालकही आहे. असे गुंतागुंतीचे तत्वज्ञान समजण्यासाठीसुद्धा माणसाला खूप उच्च दर्जाचा बुद्ध्यांक असावा लागतो. तो नसल्यामुळे सर्वसामान्य लोक सगळी परमेश्वराची लीला या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत नाहीत. पण या विश्वातली रहस्ये समजून घेण्याचा वैज्ञानिक पद्धतीने प्रयत्न करणारे शास्त्रज्ञ लोक त्यावर विचार करतात. अध्यात्मामधल्या परमेश्वराबद्दलच्या या विचारात अनेक काल्पनिक गोष्टी गृहीत धरल्या आहेत असे त्यांना वाटते. पण धार्मिक लोक त्या गृहीतकांनाच ज्ञान म्हणतात आणि जे लोक ते मानत नाहीत अशा लोकांना अज्ञानी ठरवतात. इथे अध्यात्म आणि विज्ञान या क्षेत्रांतील भक्तांमधला संघर्ष समोर येतो.

. . .

गुरु, बाबा, कीर्तनकार वगैरे लोक नेहमीच विज्ञानाची टिंगल करत असतात किंवा ते कसे हिणकस आहे असे या ना त्या मार्गाने दाखवत असतात हे समजण्यासारखे आहे. सर्वसामान्य लोकांनी वैज्ञानिक दृष्टीने तर्कशुद्ध विचार केला तर त्यांच्यावर आपली पकड राहणार नाही ही भीती त्यांना वाटत असावी. आजकाल त्यांनी एक नवीन युक्ती वापरायला सुरुवात केली आहे. "नासाने किंवा कुठल्याशा जर्मन शास्त्रज्ञांनी सुद्धा हे मान्य केले आहे" असे म्हणत हे लोक त्यांना वाटेल ते (खोटे) सांगायला लागले आहेत आणि  बाबावाक्यम् प्रमाणम् असे मानणारे त्यांचे अनुयायीही सर्रास तशी विधाने करायला लागले आहेत. कोणी म्हणतात आपल्या डोळ्यांना तर फक्त काही वेव्हलेंग्थचा प्रकाश दिसतो आणि कानांना फक्त काही फ्रिक्वेन्सीजचा ध्वनि ऐकायला येतो.  त्यामुळे विज्ञानाने काढलेली माहिती नगण्य आणि अपूर्ण असते. या विश्वात त्याच्या पलीकडेसुद्धा खूप काही आहे. हे तसे पाहता खरेही आहे.

विज्ञान हे अपूर्णच आहे आणि कितीही प्रगति केली तरी त्यानंतरही ते नेहमी अपूर्णच राहणार आहे यात काही दुमत नाहीच, कारण कालपरवा मिळालेल्या माहितीमधून आज नवे प्रश्न मनात उत्पन्न होतात आणि उद्यापरवातेरवा अनेक दिवस (महिने, वर्षे, शतके वगैरे) त्यांची उत्तरे शोधण्यात जातात, कधी कधी तर ती उत्तरे मिळतच नाहीत, असेच आजवर चालत आले आहे आणि पुढेही चालत राहणार आहे. पण आपल्याला न दिसणारे किरण आणि न ऐकू येणारे ध्वनि या विश्वात आहेत हे मात्र विज्ञानामुळेच आपल्याला समजले आहे, कारण ते ग्रहण करण्याची साधने वैज्ञानिक संशोधनांमधूनच तयार केली गेली. त्या बाबतीत विज्ञानाने आता पुष्कळ प्रगति केली आहे. 

"आमच्या ऋषीमुनींना अंतर्ज्ञानानेच सगळे समजत होते" असे अध्यात्मवादी लोक सांगतात. पण त्याचा आज काय उपयोग आहे ? त्या ऋषीमुनींचे टेक्निक कुणी स्वामीने शोधून ते सामर्थ्य जगाच्या उपयोगासाठी जगाला दिले तर त्याचा जगाला फायदा होईल.

. . .

अध्यात्माच्या मार्गाने जाणारे लोक विज्ञाननिष्ठांना 'अज्ञानी' म्हणतात, तर विज्ञानाचे वाटसरू अध्यात्म हे पूर्णपणे काल्पनिक आहे आणि त्यावर विश्वास ठेवणारे लोक अंधश्रद्धाळू किंवा अडाणी आहेत असे समजतात. त्यांचा वाद ऐकला तर ते एकच भाषा बोलत आहेत की नाही याबद्दल मनात शंका येते. त्याचे कारण ज्ञान, विज्ञान, अज्ञान, तत्वज्ञान वगैरे शब्दांचे त्यांना अभिप्रेत असलेले अर्थ वेगवेगळे असतात. कदाचित सर्वांना माहीत असेल किंवा नसेल, पण मराठी भाषेतला पहिला शब्दकोष जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि थॉमस कँडी या दोन इंग्रजांनी दीर्घकाळ प्रचंड मेहनत घेऊन तयार केला. श्री.दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी त्यांच्या सहकार्याने मराठी भाषेचे व्याकरण तयार केले आणि नव्या प्रमाणभाषेची सुरुवात झाली. पुढे सगळ्या लेखकांनी आपापली पुस्तके त्या प्रमाणभाषेत लिहिली आहेत.

इंग्रजीमधील  Knowledge, Science, Ignorance आणि Philosophy या शब्दांना ज्ञान, विज्ञान, अज्ञान आणि तत्वज्ञान हे मराठी प्रतिशब्द दिले गेले. बहुतेक मराठी लेखकांनी इंग्रजी साहित्याचाही अभ्यास केला होता आणि त्यांच्या लेखनावर इंग्रजी पुस्तकांमधील विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे या इंग्रजी भाषेतले मूळ अर्थ या मराठी शब्दांना येऊन चिकटले आणि रूढ झाले. आपणही, निदान मी तरी, ते मराठी शब्द त्या इंग्रजी अर्थांनी वापरत आलो आहे. पण गीता, भागवत यासारख्या धार्मिक ग्रंथांमध्ये हे संस्कृत शब्द वेगळ्या अर्थांनी योजले असावेत असे संदर्भावरून वाटते. कुठल्याही विषयाचे नॉलेज म्हणजे त्याचे ज्ञान असे आपल्याला वाटते, पण मी जन्मभर कष्ट करून कणाकणाने शिकून घेतलेले सायन्स आणि इंजिनियरिंगमधले नॉलेज हे ज्ञान नाहीच, याला आम्ही ज्ञान म्हणत नाही असे एका पंडिताने सांगितले तेंव्हा मला धक्का बसला.

.. .

तो विद्वान म्हणाला की सायन्स आणि इंजिनियरिंगसारखे नॉलेज असलेच तर विद्या किवा विज्ञानाचा भाग असेल, ज्ञान नाहीच. त्याच्या मताप्रमाणे ज्ञान याचा अर्थ आत्मज्ञान किंवा स्वतःला झालेली आत्म्याची ओळख असा आहे आणि ते  ज्ञान पुस्तके वाचून किंवा शिकून मिळत नाही.  वर्षानुवर्षे किंवा अनेक जन्मांमध्ये समाधी, साधना, चिंतन वगैरे योगाने तपश्चर्या केल्यानंतर ते प्राप्त होते, किंवा ते देण्यासाठी महाज्ञानी गुरूचा अनुग्रह होणे आवश्यक असते. खरे 'ज्ञानी' सत्पुरुष क्वचितच जन्माला येतात आणि बहुतेक वेळा ते पूर्वजन्मांमध्ये संपादन करून ठेवलेले ज्ञान या जन्मात आपल्यासोबत घेऊन येतात अशी भाविकांची श्रद्धा असते. 

संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या सातव्या अध्यायात ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान याबद्दल असे लिहिले आहे.

मग ज्ञानाचिये वेळे । झांकती जाणिवेचे डोळे ।

जैसी तीरीं नाव न ढळे । टेकलीसांती ॥ ४ ॥

कारण की स्वरूपज्ञानाचे वेळी बुद्धीचे डोळे झाकतात. ज्याप्रमाणे होडी नदीच्या तीराला टेकली असता पुढे सरकत नाही ॥७-४॥

तैसी जाणीव जेथ न रिघे । विचार मागुता पाउलीं निघे ।

तर्कु आयणी नेघे । आंगीं जयांच्या ॥ ५ ॥

त्याप्रमाणे बुद्धीचा प्रवेश होत नाही व विचार जेथून मागे फिरतो आणि ज्याच्या संबंधाने तर्काचे चातुर्य चालत नाही ॥७-५॥

अर्जुना तया नांव ज्ञान । येर प्रपंचु हें विज्ञान ।

तेथ सत्यबुद्धि तें अज्ञान । हेंही जाण ॥ ६ ॥

हे अर्जुना, त्याचे नाव ज्ञान होय. दुसरा जो प्रपंच ते विज्ञान आहे आणि प्रपंचाचे ठिकाणी खरेपणाची बुद्धी असणे त्यास अज्ञान म्हणतात, हेही तू समज. ॥७-६॥

. . .

पुस्तके वाचून किंवा शिक्षकाकडून शिकता येते ती विद्या असते, ते ज्ञान नव्हे असा काही तरी ज्ञान या संस्कृत शब्दाचा मूळ अर्थ असावा असे दिसते. प्राचीन काळात लहान मुलांना विद्याध्ययनासाठी गुरुगृही पाठवत असत. मोठेपणी काही मुमक्षु लोक सद्गुरूकडे  किंवा हिमालयात जाऊन तपश्चर्या करून ज्ञान प्राप्ती करत असत असे सांगितले जाते.  विज्ञान या शब्दाचा अर्थ 'प्रपंचू' म्हणजे रोजच्या जीवनात  उपयोगी पडणारे ज्ञान असा असावा. गीतेच्या सातव्या अध्यायाचे नाव ज्ञानविज्ञानयोग असे आहे आणि सुरुवातीलाच "ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः" म्हणजे "मी तुला विज्ञानासह सगळे काही ज्ञान सांगतो" असे श्रीकृष्णाने म्हंटले आहे. पण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र वगैरे जे काही आपण विज्ञानातून शिकतो त्यातले काहीही त्या अध्यायात पुढे कुठेच आलेले नाही. पंचमहाभूते आणि मन, बुद्धी व अहंकार यांच्यामधून प्रकृति (निसर्ग) होते एवढा भाग कदाचित विज्ञान असेल, पण पुढे गेल्यावर "ते सर्वही मीच आहे" वगैरे ज्ञान किंवा अध्यात्म दिले आहे.

कणाद, भास्कराचार्य आदि प्राचीन भारतीय वैज्ञानिकांनी सांगितलेले सिद्धांत 'सायन्स'मध्ये येत असले तरी ते परंपरागत गुरुशिष्यपरंपरेमधून किंवा वंशपरंपरेतून आपल्यापर्यंत येऊन पोचले नाहीत. त्यांच्या काळात तरी ते विद्वान त्याला विज्ञान म्हणत होते की नाही कोण जाणे. त्यामुळे मी जे काही थोडे फार विज्ञान शिकलो ते पूर्णपणे पाश्चात्य शास्त्रज्ञांनी निर्माण केलेल्या सायन्समधूनच शिकलो आहे. कदाचित विज्ञान या मूळ संस्कृत शब्दात  इतिहास, भूगोलासारख्या इतरही अनेक विषयांच्या सामान्य ज्ञानाचा समावेश त्या काळात होत असावा. सायन्स हा इंग्रजी शब्दही तसा फार जुना नाही. पूर्वी त्या विषयाला नॅचरल फिलॉसॉफी म्हंटले जात असे. पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले अचेतन पदार्थ आणि मन, बुद्धी, अहंकार असलेले सजीव यांचा अभ्यास म्हणजे विज्ञान असा त्या शब्दाचा प्राचीन अर्थ असला तर तो अर्थही सायन्स या शब्दाच्या जवळ येतो. आता आपण माती, पाणी, हवा वगैरेसुद्धा मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे यातून निर्माण झाली आहेत असे म्हणतो एवढेच.

. . .

विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे माणसाचे कष्ट आणि वेळ वाचवणारी साधने, तसेच अनेक नवनवी उपयुक्त अशी उत्पादने उपलब्ध झाली. या सर्वांमुळे लोकांच्या जीवनशैलीमध्ये बदल झाले, त्यांचे इतर लोकांवर असलेले परावलंबित्व कमी झाले, त्यामुळे सामाजिक परिस्थिति पार बदलली. काही प्रमाणात कुटुंबव्यवस्थाच विस्कळित होत गेली. यातून काही जुने प्रश्न नाहीसे झाले, तर अनेक नवे प्रश्न उद्भवले आहेत. माणसाचे शारीरिक कष्ट कमी झाले असले तरी त्याचे मानसिक तणाव वाढले आहेत असे काही लोकांना वाटते . ते लोक त्यासाठी  विज्ञानाला सर्वस्वी जबाबदार धरतात आणि अध्यात्म हा त्यावर नामी उपाय आहे असे प्रतिपादनही करतात. अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात जिथे हे तणाव आधी सुरू होऊन विकोपाला गेले तिथे काही स्वामी, योगी आचार्य वगैरेंना चांगला प्रतिसाद मिळाला आणि मिळत आहे. त्यांच्या संस्थांची संस्थाने जगभर उभी राहिली आहेत आणि ती पसरत चालली आहेत.  

या सर्वांचा अध्यात्माशी किती थेट संबंध आहे हे मला माहीत नाही. पण त्यांच्या अनुयायांचे मानसिक तणाव काही प्रमाणात तरी कमी झाले असावेत असे वाटते. भारतातले माझ्या आईवडिलांच्या पिढीपर्यंतले बहुतेक लोक आपल्या प्रपंचाचा आणि काळज्यांचा भार परमेश्वरावर सोडून देत असल्यामुळे ते लोकही त्यांना मानसिक त्रास होईल इतके जास्त टेन्शन घेत नव्हते. "आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार, ठेवोनिया । " अशा वृत्तीने ते रहात होते. पण आमच्या पिढीपासून देवावरचा विश्वास कमी होत गेला आणि काही वेळा आपण  स्वतःही काही करू शकत नाही अशा असहाय्य परिस्थितीला सामोरे जाणे कठीण व्हायला लागले. अशा आजच्या काळातल्या लोकांना वारकरी संप्रदायासारख्या जुन्या परंपरांपेक्षा आधुनिक काळातल्या आध्यात्मिक  गुरूंचे आकर्षण जास्त वाटते. आता त्यांच्या सहाय्याने ते मोठ्या संख्येने अध्यात्माच्या मार्गाकडे वळू पहात आहेत. त्यांना आत्मा, परमात्मा वगैरेंचे ज्ञान आणि मोक्ष वगैरे मिळो ना मिळो, पण त्या निमित्याने ते व्यसनापासून दूर रहात असतील, त्यांच्यातला प्रामाणिकपणा, माणुसकी, परोपकार आणि दानवृत्ती वगैरे गुण  वाढत असतील तर ते त्यांच्यासाठी तसेच समाजासाठीही चांगलेच आहे.

. . .

मी गेले काही दिवस अध्यात्माची थोडी तोंडओळख करून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मराठी आणि हिंदी या भाषांमधून मला जी माहिती सुलभपणे आंतर्जालावर मिळत गेली तेवढ्यातूनच काही समजून घेण्याचा हा अगदी तोकडा प्रयत्न आहे. त्यातून मला जेवढे समजत गेले ते मी या आधी तेरा भागांमध्ये लिहिले आहे. यावरून मला असे दिसले की अध्यात्म या शब्दाची सर्वसंमत अशी व्याख्या नाही. या जगात कालपरवा जे काही होते ते नाहीसे झाले आणि आज जे काही आहे ते उद्यापरवा इथे असणार नाही. पण अनादि अनंत असा परमात्मा पूर्वीही होता आणि पुढेही असणार आहे हे अंतिम सत्य आहे, तसेच तो परमात्मा सूक्ष्मरूपाने आपल्यात वास करत आहे. त्याला समजून घेण्याचा प्रयत्न असा काहीसा अध्यात्माचा अर्थ असावा. प्रत्येकाने तो प्रयत्न करावा अशा उपदेश केला जात असतो.

दुसरी गोष्ट म्हणजे इंद्रियांना मिळणारे सुख तात्कालिक असते आणि ते कमी कमी होत जाते हे आपण पहातोच. लाडवाचा पहिला तुकडा खातांना छान लागतो, पण दोन तीन लाडू खाल्यानंतर आणखी खावासाही वाटत नाही. एकादे गाणे कितीही आवडले तरी आपण ते सतत ऐकत रहात नाही. पण परमेश्वराला भेटल्यानंतर आत्म्याला मिळणारा परमानंद, चिदानंद वगैरे दैवी सुख या सर्व भौतिक सुखांच्या मानाने असंख्यपटीने मोठे आणि निरंतर असे असते असे सांगितले जाते. पण ते मिळवण्यासाठी आधी स्वतःच्या इंद्रियांना पूर्णपणे काबूत ठेवलेत तरच तुम्ही एक पाऊल तरी पुढे जाल अशी अध्यात्माची अट आहे.

या उलट "ये जिंदगी ना मिले दोबारा" असे म्हणत करता येईल तितकी मौजमजा करून घ्यावी असा चंगळवादी विचार आजकाल प्रबळ होत चालला आहे आणि मिळू शकेल तेवढे सुख ओरबाडून घेणे चालले आहे. त्यातून पर्यावरणाच्या प्रदूषणासारखे जागतिक प्रश्न उद्भवल्यामुळे विचारवंतांना  भविष्याची काळजी वाटायला लागली आहे. माणसामाणसांतही सामंजस्य न राहिल्यामुळे ते एकमेकांबरोबर सहकार्य करण्याऐवजी  एकमेकांचा विनाश करू पहात आहेत.  त्याने अध्यात्माचा विचार केला किंवा तो ते करू शकला तर ते निश्चितपणे समाजासाठी चांगले होईल.

मानव हासुद्धा एक सोशल अॅनिमल आहे, तो कळप करून राहणारा आहे. यातून निघालेली नैसर्गिक अंतःप्रेरणा (इन्स्टिंक्ट) त्याला पुढेही तारून नेईल, असेही सांगितले जाते, पण  ही अतःप्रेरणा असणे हाच मुळी मानवांना अंतरात्मा असल्याचा पुरावा आहे  आणि निसर्ग हे परमात्म्याचेच रूप आहे असे अध्यात्मवादी सांगतात.

(समाप्त) 






 *****************

Sunday, November 13, 2022

बँकांचे व्याजदर


बँका ठेवीदारांना देत असलेल्या व्याजाचे दर कमी कमी होत गेल्यामुळे अनेक वृद्ध अडचणीत आले आहेत, तर कर्जावरील व्याजाचे दर कमी झाल्यामुळे गृहकर्ज घेतलेल्या लोकांचे ईएमआयचे हप्ते कमी झाले म्हणून ते सुखावले आहेत. एकाच कुटुंबात अशा दोन्ही प्रकारचे लोक दिसत असल्यामुळे ते जरा भांबावलेही आहेत. या पार्श्वभूमीवर मी मुखपुस्तकावर लिहिलेल्या लेखमालिकेचे संपादन करून ती या एकाच लेखात सादर केली आहे. 


बँकांचे व्याजदर -१

मी १९६१मध्ये माझे बँकेतले पहिले खाते उघडले आणि त्यानंतर सेव्हिंग, रिकरिंग, फिक्स्ड डिपॉझिट वगैरे अनेक खाती उघडली आणि बंद केली. असा मला गेल्या साठ वर्षांचा अनुभव आहे. त्यामधून मला जेवढे समजले तसे इथे लिहिले आहे. यात उगाच अर्थशास्त्राचे सिद्धांत किंवा परिभाषा आणलेली नाही.

त्या काळात बचत खात्यावर सुमारे २% व्याजाचा दर होता आणि मुदतींच्या ठेवींवर तो ४-५ % पर्यंत जात होता. आता पुन्हा साधारण तशीच परिस्थिति आली आहे. मध्यंतरीच्या साठ वर्षांमध्ये ते दर बरेच वाढले होते, पण आता ते कमी झाल्यामुळे अनेक लोकांचे नुकसान आणि अपेक्षाभंग झाला आहे आणि त्यामुळे त्यांच्या मनात असंतोष निर्माण होणे हे अगदी साहजिक आहे. मीसुद्धा समदुःखी असल्यामुळे त्यांच्याशी सहमत आहे. पण हे दर कशामुळे वाढतात किंवा कमी होतात हे ही समजून घेणे गरजेचे आहे. यासाठी बँका नेमके काय काम करतात हे पहायला हवे.

अगदी सोप्या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास ज्या लोकांकडे पैसे आहेत त्यांच्याकडून या बँका पैसे घेतात, ते पैसे व्यापार किंवा उद्योग करणाऱ्या लोकांना कर्जाने देतात. त्या लोकांना त्यातून जो नफा मिळतो त्यातून ते लोक बँकांना व्याज देतात, त्यातला थोडा भाग बँका ठेवीदारांना देतात आणि उरलेल्या भागातून स्वतःचा खर्च चालवतात व नफा कमावतात. या सर्वांच्याकडून सरकार कर वसूल करते. अशा प्रकारे सगळ्यांचाच फायदा होत असल्यामुळे ही व्यवस्था चालत राहते आणि त्याची वाढ होत जाते.


बँकांचे व्याजदर -२

बँकेत आपले पैसे ठेवायला तयार असणारे ठेवीदार आणि बँकेकडे कर्ज मागायला येणारे कर्जदार हे दोघेही बँकेच्या अस्तित्वासाठी महत्वाचे घटक असतात. पहिल्यांसाठी बँकेला पुरेसा विश्वास कमावावा लागतो. कुणीही शहाणा माणूस आपल्या कष्टाचे पैसे बँकेत ठेवायच्या आधी तिथे आपले पैसे सुरक्षित राहतील आणि ते आपल्याला परत मिळतील याची खात्री करून घेईल. कुणाला कर्ज देतांना तो माणूस कर्जाऊ घेतलेले पैसे परत करेल तसेच त्यावरचे व्याज न चुकता देत जाईल याची खात्री बँकेला करून घ्यावी लागते.  बँकेत पैसे ठेवणाऱ्याला जास्तीत जास्त व्याजाचा दर हवा असतो, तर कर्ज घेणाऱ्याला तो कमीत कमी असावा असे वाटते. या दोघांनाही सांभाळून घेण्याची कसरत बँका करतात.  त्यांच्याकडे ठेवीच आल्या नसतील तर ते कर्ज कसे देणार ? आणि कर्ज देण्यासाठी कोणी विश्वासू गिऱ्हाईक मिळाले नाही तर बँकेला कुठून उत्पन्न मिळणार? हा समतोल साधता आला नाही किंवा कर्जदार पैसे घेऊन पळून गेला तर ती बँक बु़डते. अशा प्रकारचे घोटाळे होऊन अनेक बँका बुडल्या आहेत आणि त्यांच्याकडे ज्यांनी ठेवी ठेवल्या होत्या त्या खातेदारांचेही अमाप नुकसान झाले आहे. ते नुकसान कमी व्हावे यासाठी सरकारने काही कायदे केले आहेत.

पूर्वी देशातल्या सगळ्या बँका खाजगी क्षेत्रात होत्या. माननीय इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना त्यांनी त्यातल्या सगळ्या सर्वात मोठ्या बँकांचे एका फटक्यात राष्ट्रीयीकरण केले, पण त्यांचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून धरले. या सरकारी बँका कधीच बुडणार नाहीत असा विश्वास लोकांना वाटायला लागला. काही प्रमाणात ही परिस्थिति अजून तशीच आहे. पुढे सरकारीकरण झालेल्या बँकांमध्ये महत्वाच्या पदांवर सरकारी अधिकारी नेमले गेले, ते आपली लालफीताशाही सोबत घेऊन गेले. बँकेतल्या कर्मचाऱ्यांनी मजबूत आणि आक्रमक अशा कामगार संघटना उभ्या केल्या. सरकारच्या दबावाखाली ग्रामीण किंवा दुर्गम विभागात न चालणाऱ्या शाखा काढल्या गेल्या, पण तिथे पुरेसा व्यवसाय होऊ शकत नव्हता. कर्जवाटपावरही काही दबाव यायला लागले. अशा काही कारणांमुळे या बँकांमधल्या कार्यक्षमतेवर आणि कार्यकुशलतेवर परिणाम व्हायला लागला. या शतकाच्या सुरुवातीपासून सरकारच्या धोरणात बदल झाला आणि खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन मिळायला लागले. त्यानुसार काही खाजगी बँका सुरू झाल्या आणि त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व मॅनेजमेंट स्टाइलच्या जोरावर भरघोस आघाडी घेतली असे चित्र दिसते.  पण हा या लेखाचा मुख्य विषय नाही. 


बँकांचे व्याजदर - ३

मी आज एक हजार रुपये बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पाच टक्के व्याजाने ठेवले तर मला वर्षभरानंतर त्याच्या व्याजापोटी पन्नास रुपये मिळतील आणि माझ्याकडे १०५० रुपये होतील. पण माझ्या पाकिटात १००० रुपये असले काय किंवा १०५० रुपये असले काय? त्याने मला काय फरक पडतो? मी आज बाजारात जाऊन माझ्या गरजेचे सामान आणले तर मात्र मला १००० रुपयात जेवढे सामान मिळेल त्यापेक्षा १०५० रुपयात थोडे जास्त मिळेल.  पण वर्षभरात सगळ्या मालाचे दर पाच टक्क्याने वाढले तर आज १००० रुपयांना मिळणाऱ्या सामानासाठीच मला एक वर्षानंतर १०५० रुपये द्यावे लागतील, त्याहून जास्त काहीच मिळणार नाही. मग त्या व्याजाचा मला काय उपयोग झाला? मी ते पैसे बचत खात्यातच ठेवले तर मला फक्त वीस रुपयेच व्याज मिळेल, म्हणजे मी आज १००० रुपयांना जेवढे सामान घेऊ शकतो तेवढेही एक वर्षानंतर घेऊ शकणार नाही, आणि ते पैसे मी घरीच ठेवले तर त्याहूनही कमी सामान मिळेल. थोडक्यात सांगायचे झाल्यास जेंव्हा बाजारभाव वाढत असतात तेंव्हा आपल्याकडे असलेल्या पैशाचे मोल आपोआप कमी होत जाते. ते बँकेत ठेवले तर आपल्या खात्यामधल्या शिल्लकेचा आकडा वाढतांना दिसला तरी त्याची किंमत कमीच होत जाते हे मी गेली साठ वर्षे पहात आलो आहे. या सगळ्या काळात बँका देत असलेल्या व्याजाचे दर महागाईत होत असलेल्या वाढीच्या दराच्या तुलनेत कमीच राहिलेले आहेत. 

दर महिन्याला माझा पगार नेहमी बचत खात्यात जमा होत असे, त्यातला महिन्याचा खर्च करून झाल्यावर उरलेला तिथेच शिल्लक रहात असे. पुढे मागे अडीअडचणीला लागतील म्हणून मी ते पैसे राखून ठेवत असे. कधी मधी तशा गरजाही निर्माण होत असत किंवा एकादी नवी वस्तू विकत घेतली जात असे आणि ती शिल्लक कमी होत असे. अशा प्रकारे मी तरी माझ्या आयुष्यात आपले बहुतेक सगळे पैसे सेव्हिंग अकाउंटमध्येच ठेवले आहेत.  क्वचितच कधी दीर्घ मुदतीची खाती उघडली होती. त्यामुळे वर लिहिल्याप्रमाणे बँकेच्या व्याजामधून मला जेवढे काही उत्पन्न मिळाले असेल ते सगळे वाढत गेलेल्या महागाईनेच गिळंकृत केले. त्यातून माझ्या संपत्तीत काही वाढ झाली नाही.


बँकांचे व्याजदर - ४

पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात मुंबईमधले काही मध्यमवर्गीय लोक नोकरी करताकरता विमे उतरायचा जोडधंदा रत असत. ते लोक एकादा मुलगा नोकरीला लागला रे लागला की त्याला घरात, ऑफिसमध्ये किंवा कुठेही गाठून त्याच्याशी गोड गोड बोलून त्याने विमा उतरवणे किती गरजेचे आहे हे पटवून द्यायचा प्रयत्न करत असत. अशा अनेक एजंटांना यशस्वीरीत्या तोंड देऊन टाळल्यानंतर माझ्या एका जवळच्या मित्राच्या सासऱ्याने अखेर मला गाठलेच आणि माझा ही विमा उतरवूनच दिला. त्यावेळी माझा पगार दरमहा पाचशे रुपये होता हेही त्याला माहीत होते. आपल्याकडच्या पुस्तकातली अनेक पाने उघडून मला निरनिराळे पर्याय सांगून त्यानेच माझ्यासाठी सर्वात योग्य असा पर्याय निवडला.

 त्याप्रमाणे दर वर्षाला पाचशे रुपये भरले तर ३०-३२ वर्षांसाठी पंधरा हजार रुपयांचे कव्हर मिळणार होते. म्हणजे माझे काही बरेवाईट झाले तर माझ्या कुटुंबाला माझा तीस महिन्यांचा पगार एकदम मिळेल, ते लोक लगेचच अगदीच रस्त्यावर येणार नाहीत, त्यांना सावरायला अवधी मिळेल वगैरे. तेंव्हा तर माझे लग्नही झालेले नव्हते, पण भावी कुटुंबाची काळजी घेण्याची पूर्वतयारी मी आधीच करून ठेवत होतो. त्याने आणखी सांगितले की मी देत असलेले पाचशे रुपयेसुद्धा आयुर्विमा महामंडळ माझ्या नावाने जमा करत राहील आणि त्यावर बँकेप्रमाणे व्याजही चढवत राहील असे करून मुदत संपल्यावर मला मी भरलेल्या हप्त्यांच्या दुप्पट म्हणजे ३०-३२ हजार रुपये एकदम मिळतील, म्हणजे साठपासष्ठ महिन्यांचा पगार हातात येईल. अशा प्रकारे नोकरी संपल्यावरसुद्धा माझ्या हातात  भरपूर पैसे रहातील. त्या काळात तरी रिटायर होऊन पाच सहा वर्षे जगलेले कोणीच माझ्या माहितीत नव्हते. त्यामुळे त्याच्या पुढचा विचार करायची गरज नव्हती. "योगक्षेमम् वहाम्यहम्" असे ब्रीदवाक्य असलेल्या आयुर्विमा महामंडळाकडे माझ्या क्षेमकुशलाची जबाबदारी सोपवून मी मुक्त झालो होतो.

त्या हुषार गृहस्थाने एक गोष्ट मात्र माझ्यापासून लपवून ठेवली होती, ती म्हणजे चलनवाढ किंवा इन्फ्लेशन! मला शेवटी प्रत्यक्षात जी रक्कम मिळाली ती त्या काळातल्या एका महिन्याच्या पगाराइतकीही नव्हती आणि कधी किंवा कुठे खर्च होऊन गेली ते कळलेही नाही.


बँकांचे व्याजदर - ५

"अंथरूण पाहून पाय पसरावे" या म्हणीचा जप करत आणि अत्यंत काटकसरच्या वातावरणात माझे लहानपण गेल्यामुळे ती सवय माझ्या रक्तात भिनली होती. तरीही बरेचसे समवयस्क मित्र, शेजारी पाजारी आणि नातेवाईक यांच्या घरी एकादी नवी वस्तू  आलेली दिसली की ती आपल्याकडेही असायला हवी असे वाटायला लागतेच आणि बँकेतली शिल्लक डोळ्यांना दिसत असेल तर घरात त्या वस्तूचे आगमनही होतेच असा संसारशास्त्राचा नियम आहे. त्यामुळे ती बँकेत साठलेली शिल्लक पुन्हा कमी होऊन जात असे. पण आपल्या मुलांच्या भवितव्यासाठीसुद्धा आपण काही तरी करायला हवे या भावनेची टोचणीही असे. म्हणून जेंव्हा त्यांनी शाळेत प्रवेश केला त्याच वेळी मी त्यांच्यासाठी रिकरिंग डिपॉझिट्स उघडली. त्यामुळे दर महिन्याला थोडे पैसे वेगळ्या खात्यात जमा होतील आणि ते शिल्लकेमध्ये दिसणार नाहीत याची व्यवस्था झाली.

मी विमा उतरवला तेंव्हा त्याचा हप्ता भरणे जरा जड वाटत होते, पण पगार, महागाई आणि महागाईभत्ता यात वाढ झाल्यानंतर तो भार हलका होत गेला आणि त्याच्या जोडीला या आवर्ती योजनांचे हप्ते भरणे शक्य झाले. माझे काही मित्र मला हसायचे, माझी थट्टा करायचे. एका मित्राने तर मला विचारलेच, "अरे, तुझ्या रिकरिंग डिपॉझिट्सचे असे किती पैसे मिळणार आहेत? दहा वर्षांनंतर त्याला काय किंमत राहणार आहे आणि त्यातून तू मुलांना किती शिक्षण देणार आहेस?"

मी म्हंटले, "मला बँकेकडून मिळणारे सगळे व्याज जरी इन्फ्लेशनने खाल्ले तरी मी दहा वर्षे भरत असलेल्या पैशाएवढी तरी त्याची किंमत राहील, शिवाय त्यावर इनकमटॅक्समध्ये सूट मिळेल हा फायदा आहे.  एवढे पैसे पुरेसे असणार नाहीत हे मलाही मान्य आहे, पण निदान तेवढे तरी माझ्या हाताशी राहतील. ते कमी पडले तर मी तुझ्याकडे मागायला येईनच. तेंव्हा तू मला मदत करशील ना?"

त्याने लगेच विषय बदलला.


बँकांचे व्याजदर - ६

बहुतेक सगळ्या मराठीभाषी मुलांनी साने गुरूजींचे श्यामची आई हे पुस्तक वाचलेले असेलच, मदर इंडिया हा सिनेमाही पाहिला असेल. पूर्वीच्या काळी खेड्यातले लबाड सावकार गोरगरीबांना कसे लुबाडत असत याचे हृदयविदारक चित्रण त्यात केले आहे. ते निर्दयी लोक गरजू गरीबांकडून त्यांचे दागदागिने, भांडीकुंडी, बैलजोडी, घर, शेतजमीन वगैरे जे असेल ते गहाण ठेऊन घेऊन त्यांना कर्ज देत असत आणि त्यावर जबरदस्त दराने व्याज आकारत.  ठराविक मुदतीत ते लोक त्या कर्जाची व्याजासह परतफेड करू शकले नाहीत तर गहाण ठेवलेल्या वस्तू जप्त करून टाकीत आणि गुंडांना पाठवून त्यांचे घर, जमीन वगैरे आपल्या ताब्यात घेत असत. अशा प्रकारे एकादा माणूस एकदा का सावकारी पाशात अडकला की त्याची पुरती विल्हेवाट लावून ते सावकार गबर होत असत.

गावोगावी बँका उघडल्यानंतर त्यांनी लोकांना वाजवी दराने कर्जे द्यायला सुरुवात केली. त्या लोकांची घरे आणि शेते बळकावून ती राखत बसण्यात बँकांना विशेष रस नव्हता. यामुळे सावकारांच्या जुलुमाला थोडा आळा बसला असेल.  माझ्या आधीच्या पिढ्यांमधल्या प्रतिष्ठित लोकांना कुणाकडूनही कर्ज घेणेच कमीपणाचे वाटत असे. माझ्या वडिलांनी जन्मभरात कधीही सावकाराकडूनच नव्हे तर कुठल्या बँकेकडूनही कर्ज घेतले नाही. ऋण काढून कुठलाही सण साजरा केला नाही, त्यांना सहज परवडेल एवढीच मौजमजा केली. कधीही उधारीने सामान आणले नाही. "मी कुणाचे एक पैशाचेही देणे लागत नाही." असे ते स्वाभिमानाने सांगत असत आणि तशीच शिकवण त्यांनी आम्हाला दिली. मीसुद्धा वयाच्या ४०-४२ वर्षांपर्यंत त्या शिकवणीचे कसोशीने पालन केले. कुठल्या गोष्टीसाठी आपल्यालाही बँकेकडून कर्ज मिळू शकेल, ते आपण घ्यावे असा विचारही कधी मनात आणला नाही. 


बँकांचे व्याजदर - ७

मी १९६६मध्ये नोकरीसाठी मुंबईला आलो तोपर्यंत माझ्या कुठल्याही नातेवाइकाकडे रेफ्रिजरेटर नव्हता. मुंबई दूरदर्शन केंद्र अजून सुरू झाले नव्हते आणि कपडे धुणे हे काम कामवाल्या बाईकडे होते. मी तर एकटा असेपर्यंत मित्रांबरोबर रहात होतो आणि आम्हीच आपापले कपडे धूत होतो. पण दहा बारा वर्षातच फ्रिज, टीव्ही आणि वॉशिंग मशीन या गोष्टी मध्यमवर्गाच्या न्यूनतम गरजा झाल्या आणि घरोघरी दिसायला लागल्या. मला वाटते, त्या काळातच 'हायर परचेस'ची टूम निघाली आणि फोफावत गेली. 

या स्कीममध्ये तुम्ही अर्धीच किंवा त्याहून कमी किंमत आधी देऊन ती वस्तू घरी घेऊन जाता आणि उरलेली रकम हप्त्याहप्त्याने एक दीड वर्षात भरता. त्यासाठी एका करारावर सही करायची असते त्यानुसार जर तुम्ही हप्ते चुकवले तर दुकानदार ती वस्तू परत घेऊन जाऊ शकतो. कुठल्याही प्रतिष्ठित माणसाला ही नामुष्की झालेली आवडणार नाही आणि ९९% लोक तरी ती वेळ येऊ देणार नाहीत याची दुकानदाराला खात्री असते आणि तो दुकानदारसुद्धा गिऱ्हाईकाचा प्रतिष्ठितपणा पाहूनच हा व्यवहार करतो.

हे करतांना काही वेळा व्याजाचा दर सांगितला जातो तर कधीकधी तो शून्य टक्के आहे असेही दाखवतात, पण तो दुकानदार थोडी घासाघीस केली तर रोख खरेदीवर १०-१२ टक्के डिस्काउंट द्यायला तयार असतो. याचाच अर्थ त्याने हायर परचेसवर तेवढे व्याज लावलेले असते. बहुतेक वेळा एकादी बँक त्या दुकानदाराच्या सोबतीला असते. ती त्याला उरलेले पैसे लगेच देते आणि गिऱ्हाइकाकडून ते हप्त्यांनी वसूल करते.

हे सुद्धा एक प्रकारचे कर्ज किंवा उधारी असते म्हणून मी त्याला संमति देत नव्हतो. आधी बचत आणि नंतर खर्च हे तत्व पाळत होतो. पण तेवढी बचत करण्यात १-२ वर्षे गेली आणि तेवढ्यात किंमती वाढल्याने बोलणी खावी लागली. "पण आपल्याला नवे सुधारलेले मॉडेल मिळाले" अशी मनाची समजूत घातली.   पुढची पिढी मात्र नेहमीच बिनधास्तपणे सगळ्या वस्तू इन्स्टॉलमेंटवर घेतांना दिसते.


बँकांचे व्याजदर - ८

1985 च्या सुमाराला भारतातही क्रेडिट कार्डांचा प्रसार सुरू झाला आणि लवकरच तो चांगला फोफावला. त्या काळात मला नेहमी ऑफिसच्या कामासाठी परगावी जावे आणि तिथे दोन तीन दिवस रहावे लागत असे. विमानाचे तिकीट आणि चांगल्या हॉटेलचे भाडे बरेच असे. ऑफिसकडून सगळा खर्च मिळणार असला तरी काउंटरवर मलाच पैसे द्यावे लागत होते. त्यासाठी जास्त पैसे घेऊन जाणे आणि ते प्रवासात सांभाळणे जोखमीचे होते. मी एकदोनदा इतर प्रवाशांना क्रेडिट कार्ड वापरतांना पाहिले, चौकशी केली आणि आंध्र बँकेचे क्रेडिट कार्ड घेऊन टाकले. ज्या बँकेत माझा पगार जमा होत होता तिने अजून क्रेडिट कार्ड काढले नव्हते आणि घराजवळ कुठेही आंध्र बँकेची शाखा नव्हती. महिन्यातून एकदा ती बँक आपले बिल पोस्टाने पाठवायची आणि दिलेल्या मुदतीत एकदा तिच्या शाखेत जाऊन मी ते पैसे भरून येत असे. एकाद्या महिन्यात ते जमले नाही तर त्यावर जबर व्याज द्यावे लागत असे आणि आपले क्रेडिट रेटिंग कमी होत असे म्हणून मी शक्यतो तशी वेळ आणू दिली नाही. त्या क्रेडिट कार्डासाठी वर्षभराला थोडा चार्ज होता, पण सोय पाहता तो परवडण्यासारखा होता. 

मी सुरुवातीला विमानाची तिकीटे आणि हॉटेलची बिले यासाठी क्रेडिट कार्ड काढले असले तरी जसजसा त्याचा प्रसार वाढत गेला त्याप्रमाणे उपयोगही वाढत गेला. मोठ्या दुकानांमधली खरेदी आणि मुंबईतल्याच हॉटेल्समधले खाणे हेसुद्धा क्रेडिट कार्डावर व्हायला लागले. कार्डने पैसे दिल्यानंतर बँक ती माहिती गोळा करून महिनाभराचे बिल एकत्र पाठवत असे आणि ते भरायला काही मुदत देत असे. तेवढा जास्तीचा वेळ मला मिळत असे. फिरतीवरून परत आल्यानंतर मी सगळ्या पावत्यांसह ऑफिसमधल्या अकाउंट डिपार्टमेंटकडे क्लेम केल्यावर तो पास होऊन मला पैसे मिळायलाही वेळ लागत असे. अशा प्रकारे नेहमीच मला थोडे देणे आणि येणे असायला लागले.

नोकरीच्या सुरुवातीला मला रोख पगार मिळत असे आणि सगळा खर्चही रोखच होत असे. पाकिटातले पैसे मोजले की शिल्लक कळत असे आणि ती पुढचा पगार मिळेपर्यंत कशी पुरवायची ते ठरवता येत असे. कधी ती गरजेपेक्षा जास्त वाटली तर मग मी बँकेत थोडी रक्कम जमा करून येत असे आणि ते मला माहीत असे. पण पगार परस्पर बँकेत जमा व्हायला लागला आणि काही खर्च रोख तर काही क्रेडिट कार्डाने व्हायला लागल्यानंतर कुठल्याही दिवशी माझ्याकडे नेमके किती पैसे शिल्लक आहेत किंवा माझ्यावर किती उधारी आहे हेच मला कळेनासे झाले. माझी मुले नोकरीला लागल्यापासून याच परिस्थितीत राहिली आहेत आणि त्यांना त्याचे काहीच वाटत नाही. त्यांच्यासाठी ते अगदी नॉर्मल आहे.


बँकांचे व्याजदर - ९

बाहेरगावाहून मुंबईला नोकरीला आलेल्यांना तिथे आपलेही घर असावे अशी इच्छा असते, पण मला ती नव्हती. याचे मुख्य कारण इथल्या जागांच्या भरमसाट किंमती पाहता मला इथे माझ्या ताकतीवर घर बांधता येईल अशी कणभरही शक्यता नव्हती आणि दुसरे म्हणजे मला चांगला प्रशस्त सरकारी फ्लॅट रहायला मिळाला असल्यामुळे आपले वेगळे घर बांधायची काही गरजही वाटत नव्हती. कुणाकडूनही कर्ज घ्यायचे नाही या तत्वावर मी ठाम होतो. पण जेंव्हा वयाची चाळिशी आली तेंव्हा मी पाहिले की माझ्या आधी तसेच माझ्याबरोबर जे इतर लोक नोकरीला लागले होते त्यातल्या बहुतेक  सगळ्यांनीच सरकारकडून कर्ज घेऊन कुठे ना कुठे एक फ्लॅट घेतला  होता किंवा तो बांधला जात होता.  माझ्या बरोबर काम करत असलेल्या एका मित्राने त्या सगळ्यांच्या आर्थिक बाजूचा बारकाईने अभ्यास केला आणि मला आकडेवारीसह पटवून दिले की "हम लोग भी ये काम कर सकते हैं । हमें भी जल्द ही कुछ करना ही चाहिये।" मग माझ्या तत्वाला आणि वडिलांनी दिलेल्या शिकवणीला मुरड घालून मी त्याला साथ द्यायला तयार झालो.

हे सरकारी कर्ज जवळ जवळ फुकट वाटेल इतक्या अगदीच कमी दरात मिळते आणि रिटायर होईपर्यंत सावकाशपणे फेडायचे असते. पण ते मिळण्यासाठी आपल्याकडे आधी जमीन आणि घराची मंजूर झालेली रूपरेखा असावी लागते. आम्ही दोघांनी ऑफिसातलेच आमच्यासारखे राहून गेलेले आणखी दहा लोक गोळा केले आणि आम्ही सर्वांनी मिळून एक सोसायटी स्थापन केली. तेंव्हा वाशी इथे सिडकोकडून प्लॉट दिले जात होते, त्यातला एक आम्हाला मिळाला. तो घेण्यासाठीसुद्धा आधी बरेच पैसे लागणार होते आणि ते तर माझ्याकडे आणि दुसऱ्या काहीजणांकडे  नव्हते. पण ज्यांनी आधी घरे बांधली होती त्यांनी मार्ग दाखवून ठेवला होता. तोपर्यंत वीस वर्षे सर्व्हिस झालेली असल्यामुळे आमच्या भविष्यनिर्वाहनिधीमध्ये वीस वर्षांच्या दरमहा पगाराहून जास्त पैसे साठले होते आणि आम्ही त्यातून कर्ज घेऊ शकत होतो. अशा प्रकारे मी आयुष्यातले पहिले कर्ज माझ्याच प्रॉव्हिडंट फंडातून म्हणजे माझ्याच भविष्यकाळाकडून घेतले आणि ते हप्त्याहप्त्याने परत करायला लागलो. मला त्यावर काही व्याज द्यावे लागत नव्हते, पण तेवढ्या रकमेवर मला सरकारकडून मिळणारे व्याज मात्र बुडत होते. ते एक अदृष्य प्रकारचे नुकसान होते.


बँकांचे व्याजदर - १०

आमच्या ऑफिसातल्या १५-२० मित्रांनी मिळून त्यांच्या सोसायटीसाठी वाशीला एक बिल्डिंग बांधली होती, ती त्या वेळी नुकतीच पूर्ण झाली होती आणि त्यांना आलेल्या एकंदर खर्चाचे आकडे आम्हाला मिळाले होते. आम्हाला त्या वेळी मिळू शकणारे सरकारचे कर्ज आणि आमच्या भविष्यनिर्वाहनिधीमधून मिळू शकणारे कर्ज दोन्ही मिळून आम्हीही तेवढे पैसे उभे करू शकत होतो असे तेंव्हा दिसत होते. या दोन्ही कर्जांना 'अॅडव्हान्स' असे गोंडस नाव दिलेले असल्यामुळे 'कर्ज' न घेण्याच्या माझ्या तत्वालाही तांत्रिक दृष्टीने बाधा येत नव्हती. असा विचार करूनच मला माझ्या मित्राचे म्हणणे पटले होते आणि मी त्याला होकार दिला होता.

पण 'घर पहावे बांधून' अशी जी म्हण आहे तिचा प्रत्यय आम्हालाही येत गेला. आम्हाला जी जमीन सिडकोने दिली तिचा भावच आधीच्या मानाने दुप्पट लावला होता. शिवाय ती जमीन आम्हाला ज्या वेळी मिळाली तेंव्हा ती अजून गुढघाभर पाण्याखाली होती. पावसाळा संपल्यावर ते पाणी ओसरले असले तरी आम्हाला घर बांधायच्या आधी त्यात भर घालून जमीनीची पातळी उंचावणे जरूरीचे होतेच.  ती जमीन कमालीची भुसभुशीत असल्यामुळे  खूप खोलवर पाइल्स ठोकाव्या लागल्या. आयुष्यात एकदाच बांधलेले घर उत्कृष्टच असायला हवे असे सर्वांनाच वाटत होते. आम्ही एफ एस आयचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला. त्यामुळे बांधकामाचे क्षेत्रफळ थोडे वाढले. त्यावेळी बारा सदस्यांपैकी फक्त एकाकडेच कार होती, पण भविष्यात उरलेल्यांच्याकडेसुद्धा आली तर त्यांना पार्किंग करायला जागा हवी म्हणून तळमजला पूर्णपणे रिकामा ठेवून तिथे स्टिल्ट केले. हे दोन्ही चांगले निर्णय होते हे नंतर आलेल्या अनुभवावरून सिद्ध झाले. स्वयंपाकघर आणि बाथरूम्समध्ये त्या काळानुसार चांगल्या सोयी केल्या, त्या मात्र पुढे कालबाह्य झाल्या. मोठ्या हौसेने केलेल्या या सगळ्या गोष्टींमुळे अर्थातच घराची किंमत वाढत गेली.  शिवाय सिमेंट, पोलाद, वाळू  वगैरेंच्या किंमती खूप वाढल्या, मजूरीचे दरही वाढले. प्राथमिक अंदाज आणि प्रत्यक्ष आलेला खर्च यातली तूट भरून काढण्यासाठी आम्हालाही धडपड करावी लागलीच.

ज्या सदस्यांना त्यांचे आईवडील, मोठे भाऊ, सासरे वगैरेंचा भक्कम आर्थिक आधार होता त्यांना काही समस्या नव्हती, पण मला असे कुणाचे ठोस पाठबळ नव्हते आणि मला कुणाकडेही पैसे मागायचे नव्हतेच. हे संभाव्य घर बांधकाम सुरू होण्याच्या आधीच  सरकारकडे गहाण टाकलेले असल्यामुळे  त्यासाठी बँकेकडे कर्ज मागणे तेंव्हा शक्य नव्हते. आपल्याला कुठून कुठून पैसे मिळू शकतील याचाच मी शोध घेत राहिलो. मी थोडे शेअर्स घेऊन ठेवले होते ते विकून टाकले, ऑफिसमधल्या सहकारी पतसंस्था (क्रेडिट सोसायटी) आणि आयुर्विमा महामंडळ यांच्याकडून कर्जे घेतली,  त्या कर्जांवरचा व्याजाचा दर फार जास्त नसला तरी ८-९ टक्के इतका होता. त्या दरम्यान माझे प्रमोशन आणि पगारवाढ झाली त्याचे जे काही अरिअर्स मिळाले ते सगळे त्यातच गेले. प्रॉव्हिडंट फंडाच्या कर्जाचे मी भरलेले हप्ते आणि पगारामधून दरमहा होत जाणारी कपात यामधून तो फंड हळूहळू वाढत होता, त्यामधून पुन्हा अॅडव्हास घेतला.  त्या कालावधीत कमालीची काटकसर करून घरखर्च किमान पातळीवर ठेवला होता हे तर सांगायला नकोच. अशा प्रकारे त्या घरासाठी लागलेल्या पैशाची कशी बशी व्यवस्था करेपर्यंत मला घाम फुटला होता, डोक्यावर थोडासा कर्जांचा बोजा झाला होता आणि त्यांवर व्याज द्यावे लागत होते. ती फेडायला पुढील काही वर्षांचा काळ गेला.  तोपर्यंत 'ऑपरेशन काटकसर' सुरूच राहिली.


बँकांचे व्याजदर - ११

सरकारकडून मिळू शकत असलेला हाउस बिल्डिंग अॅडव्हान्स आणि प्रॉव्हिडंट फंडामधून घेता येत असलेला अॅडव्हान्स या दोन्ही गोष्टी मिळवणेही तसे सहज सोपे नसते. त्यासाठी बऱ्याच खटपटी लटपटी कराव्या लागतात आणि अनंत काळ वाट पहात बसावे लागते. पण त्या केल्यानंतर फक्त त्यांच्यामधून आपले घर बांधता येईल अशा गोड गैरसमजुतीतून मी या कामात उडी घेतली होती. त्यासाठी आणखी बराच जास्त खर्च येणार आहे हे बराच वेळ, श्रम आणि पैसे खर्च केल्यानंतर मला  समजले. पण आता मागे फिरण्यात अर्थ नव्हता. अनेक प्रकारची कर्जे घेऊन ते काम तडीला न्यायचे होते.

मी घेतलेल्या कर्जांच्या परतफेडीचे हप्ते त्या घराचे बांधकाम पूर्ण व्हायच्या आधीच सुरू झाले आणि त्यात माझा तेंव्हाचा अर्धा पगार जायला लागला. उरलेल्या अर्ध्या पगारातूनही अन्न, वस्त्र, निवारा या आमच्या मूलभूत गरजा भागत होत्या, त्यात काही कमी पडत नव्हते, सर्वसामान्य लोकांच्या मानाने आम्ही तसे कम्फर्टेबल जीवन जगत होतो, पण इतर अनावश्यक अवांतर खर्चांना कात्री लावावी लागली. बाजारात आलेल्या नव्या वस्तू घरात आणणे कमी झाले. आजूबाजूचे लोक जी थोडीफार चैन करत होते आणि जी आम्हीसुद्धा आधी उत्साहाने करत होतो ती आता करता येत नसल्यामुळे मन बेचैन झाले होते. एवढे करूनही ते घर ताब्यात येत नव्हते याचा जास्त त्रास होत होता. 

तरी आमच्या सुदैवाने आमच्या घराचे बांधकाम वेळेवरच आणि निर्विघ्नपणे पूर्ण झाले. आम्हाला महापालिकेकडून तसे प्रमाणपत्र मिळाले तेंव्हा तो आनंद साधेपणानेच साजरा केला. मग एक चांगला भाडेकरू मिळाला आणि त्याच्याकडून थोडे डिपॉझिट मिळाल्यावर माझ्या बँकेतल्या खात्यातला खडखडाट संपून थोडी रिस्पेक्टेबल शिल्लक दिसायला लागली. दरमहा येत असलेल्या भाड्यामधून परतफेडीच्या हप्त्यांचा भारही हलका व्हायला लागला आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. आता गाडी रुळावर यायला लागली. 

पण लगेच नवे आवश्यक खर्चही सुरू झाले. मुलांच्या कॉलेजशिक्षणासाठी कॉलेजची फी, त्यांच्या राहण्याजेवण्यासाठी, येण्याजाण्यासाठी खर्च येत होता. पण मी आता अनुभवाने निर्ढावलो असल्यामुळे नवनवीन कर्जे काढून त्याची तरतूद करत गेलो. त्याशिवाय आणखी एक मोठे कर्ज काढून कार घेतली, मग लहान कर्ज काढून घरात कॉम्प्यूटर घेतला. ती कर्जे मी सेवानिवृत्त होईपर्यंत फेडत राहिलो.


बँकांचे व्याजदर - १२

थोडक्यात सांगायचे झाल्यास मी पहिली वीस वर्षे शिक्षण घेतल्यानंतर  नोकरीला लागलो आणि नोकरीमधली पहिली वीस वर्षे जितका पगार मिळाला त्यातला बहुतेक सगळा खर्च केला. त्यातून घरात ढीगभर सामान आणले असेल, पण बँकेत फारसे काही साठवून ठेवले नाही. त्यानंतरची वीस वर्षे मी कर्जे काढत आणि पगारातून ती फेडत राहिलो. त्यामुळे सेवानिवृत्त व्हायच्या वेळीसुद्धा बँकेत जास्त शिल्लक नव्हतीच. त्यामुळे तोपर्यंत मला बँकेकडून मिळालेले व्याज अगदी क्षुल्लक होते, त्या मानाने मी घेतलेल्या कर्जांवर कितीतरी जास्त व्याज दिले होते. पण तोपर्यंत मी अखेर  पूर्णपणे कर्जमुक्त झालो. शिवाय रिटायरमेंट बेनेफिट्समधून एक घशघशीत रक्कम मिळाली. ती बँकेत किंवा पोस्टात ठेऊन आता त्यावर मला व्याज मिळायची सुरुवात झाली.

मी जर कर्जे काढलीच नसती आणि त्यावर व्याज दिलेच नसते तर कदाचित नोकरीच्या शेवटी तितके पैसे माझ्याकडे साठले असते, पण त्यातून मी फारसे काही विकत घेऊ शकलो नसतो. इतकेच नव्हे तर मी काटकसर करून जितक्या कर्जांची परत फेड केली तेवढे पैसे जरी त्या वेळी वेगळे काढून ठेवले असते तरी त्या जमा केलेल्या पैशामधूनसुद्धा माझे घर आणि गाडी मला रियायर व्हायच्या वेळी मिळाली नसती, कारण त्या वीस वर्षांमध्ये त्या घराची किंमत सातआठ पटीने वाढली होती आणि गाडी घेतल्यानंतर तिची विक्रीची किंमत घटत गेली असली तरी नव्या गाडीची (खरेदीची) किंमत दुप्पट झाली होती. या दोन्हीच्या बाबतीत मी वेळेवर कर्ज घेतले तेच बरे केले असे म्हणावे लागेल.

त्या काळात काँप्यूटर मात्र दिवसेदिवस स्वस्तच होत गेले आणि जुन्या संगणकाला तर काहीच किंमत राहिली नाही. पण मी जेंव्हा कर्ज काढून तो घेतला होता तेंव्हा मला त्याची गरज होती ती भागली हेच महत्वाचे होते. गरजेचे मोल करता येत नाही. त्या बाबतीत नफा तोटा पहायचा नसतो.


बँकांचे व्याजदर - १३

सेवानिवृत्त झाल्यावर मला सरकारी पेन्शन मिळायला लागली ती पगाराच्या सुमारे अर्धीच होती पण मुले नोकरीला लागल्यानंतर घरात उरलेल्या आम्हा दोघांसाठी ती पुरेशी होती. शिवाय पोस्ट आणि बँकेकडून थोडे व्याजही मिळत होते, त्यावेळी त्याचीही तितकीशी गरज वाटत नव्हती. त्यामुळे आम्ही काही पैसे घराच्या नूतनीकरणावर खर्च केले, दोघेजण केसरीबरोबर युरोपच्या सहलीवर जाऊन आलो आणि काही पैसे आजारपणात खर्च झाले. असे करून रिटायरमेंट बेनेफिटचे बरेचसे पैसे खर्च होऊन गेले आणि महागाई वाढत गेल्यामुळे उरलेल्या पैशांची किंमत गेल्या सतरा वर्षात फक्त पावपटच राहिली. त्यावर मिळणाऱ्या व्याजाचा दरही निम्म्यावर आला. त्याच काळात पेनशनवर मिळणारा महागाईभत्ता वाढत जाऊन पेनशनच्या रकमेचा आकडा वाढत जाऊन चौपट झाला. त्याच्यापुढे हे व्याज अगदीच क्षुल्लक झाले. पेनशनचीही बाजारातली किंमत कमी झाली असली तरी ती तग धरायला पुरेशी आहे, पण मला ती मिळत नसतीच तर?

मी जन्मभर खाजगी क्षेत्रात काम केले असते तर मला रिटायरमेंटनंतर पेनशन मिळाली नसती, पण चांगला घसघशीत फंड हातात आला असता आणि त्यावर मिळणारे व्याज त्यावेळी पुरेसे वाटलेही असते. पण गेल्या सतरा वर्षांमध्ये मी मिळेल तेवढे व्याज खात गेलो असतो आणि मुद्दलाची किंमत कमी होत होत फक्त एक चतुर्थांश झाली असती. आता व्याजाचे दरही कमी झाल्यामुळे दरमहा मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेचे मूल्य तर पावपटीपेक्षाही कमी झाले असते. थोडक्यात सांगायचे झाल्यास माझी पुरती वाट लागली असती. आज बरेचसे वृद्ध लोक या कारणाने त्रस्त झाले आहेत आणि त्यासाठी सरकारला जबाबदार धरून आगपाखड करत आहेत.


बँकांचे व्याजदर - १४

कुठल्याही वस्तूचे किंवा पदार्थाचे उत्पादन, वाहतूक आणि वितरण वगैरेवर होणारा खर्च वजा करून ते काम करणाऱ्या लोकांना फायदा झाला आणि ती वस्तू किंवा पदार्थ मिळाल्याने ग्राहकांनाही काही आनंद मिळत असेल तर ती साखळी टिकून राहते व वाढत जाते. पण लोभ हा माणसाचा एक स्वभाव असल्यामुळे आपल्यालाच जास्त फायदा मिळावा, त्यामुळे दुसऱ्याचा तोटा झाला तरी चालेल अशी त्याची प्रवृत्ती असते. मागणी आणि पुरवठा यात असमतोल झाला तर वस्तू महाग किंवा स्वस्त होतात. केंद्र आणि राज्य सरकारे आणि नगरपालिका वगैरे राज्यसंस्था उत्पादन आणि व्यापारावर निर्बंध लावतात, तसेच सगळ्यांच्याकडून कर वसूल करतात. शिवाय महापूर, दुष्काळ, रोगराई, युद्धे, अशांतता अशा कारणांमुळे तुटवडा निर्माण होतो. अशा अनेक कारणांमुळे बाजारभावामध्ये सारखे बदल होत असतात. वस्तू, पदार्थ तसेच सेवा यांचे दर कमी किंवा जास्त होत असतात. पण गेल्या सत्तर वर्षांमध्ये मी असे पाहिले आहे की त्यात सातत्याने वाढच होत आली आहे. एकादा पदार्थ काही काळ स्वस्तात मिळाला, तरी त्यानंतर तोही महाग होत गेला किंवा मिळेनासा झाला असेच होत गेले आहे.

मला यातले समजायला लागल्यापासून दर वर्षी केंद्र आणि राज्य सरकारची अंदाजपत्रके नेहमी तुटीचीच असत आली आहेत. म्हणजे आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या असा प्रकार असतो. असे करण्यामुळे विकासाची गती वाढते असे म्हंटले जाते. पूर्वी जास्त नोटा छापून सरकार ही तूट भरून काढत असे. आता सगळेच व्यवहार कॅशलेस झाल्यामुळे निव्वळ कागदोपत्रीच होत असतात. सरकार ज्यांना पैसे देते तेंव्हा ते पैसे त्यांच्या खात्यात जमा होतात आणि ते लोक ज्यांना पैसे देतात त्यांच्या खात्यांमध्ये ते पैसे ई बँकिंगनेच ट्रान्स्फर करतात. प्रत्यक्ष चलनाची देवघेव कमीच होते.  पण पैशाचा पुरवठा वाढल्यामुळे  लोकांची क्रयशक्ती वाढते. याला चलनफुगवटा असे म्हणतात आणि त्याचा परिणाम महागाई वाढण्यात होतो. हे गेली सत्तर वर्षे होत आले आहे. काही काळात काही कारणांमुळे ही महागाई झपाट्याने वाढत गेली आणि काही काळात हळूहळू वाढली एवढेच.


बँकांचे व्याजदर - १५

उत्पादन, वाहतूक आणि वितरण करण्यासाठी जे भांडवल लागते त्याचा थोडा भाग ते व्यावसायिक स्वतः घालतात आणि उरलेले पैसे बँकांकडून कर्जाऊ घेतात. त्यावर देण्यात येणारे व्याज हासुद्धा एक महत्वाचा खर्च असतो. तो ग्राहकांकडूनच वसूल केला जातो. त्यासाठी त्या वस्तूची किंमत वाढवली जाते. महागाई वाढत गेली तर दुकानदाराकडे असलेल्या मालाची किंमत आपोआप वाढून त्याला त्याचा फायदा मिळू शकतो म्हणून तो साठेबाजी करायला लागतो. अशा वेळी सरकार रिझर्व बँकेतर्फे काही उपाययोजना करते.  त्यात बँकेने देण्याच्या कर्जावर बंधने घालणे आणि व्याजाचा दर वाढवणे असे आदेश दिले जातात. व्यापाऱ्यांना कर्ज मिळाले नाही किंवा त्यावर जास्त व्याज द्यायचे असले तर तो साठा कमी करण्याचा प्रयत्न करेल, त्यासाठी किंमती स्थिर ठेवेल किंवा त्यावर डिस्काउंट देईल असा विचार असतो. बँकेला जास्त व्याज मिळत असेल तर ती डिपॉझिटर्सना अधिक व्याज देऊ शकते.  काही मोठ्या कंपन्या स्वतःच जनतेकडून जास्त व्याजावर डिपॉझिट्स घेतात. त्यांच्या स्पर्धेमुळेही बँकांना डिपॉझिट्सवर जास्त दराने व्याज द्यावे लागते.  

मी रिटायर झालो त्या काळात महागाई वाढण्याचा दर सुमारे १०% च्या आसपास होता आणि पोस्ट व बँका दीर्घ मुदतीच्या डिपॉझिट्सवर ८-९ टक्के व्याज देत होत्या. म्हणजे खरे तर तेंव्हाही पैशाची खरी किंमत दर वर्षी कमीकमीच होत होती. गेल्या सहा सात वर्षात महागाईत होणाऱ्या वाढीचा दर सुमारे ५-६ टक्क्यावर आला होता. अशा वेळी घरासाठी किंवा वाहनासाठी कर्ज घेणाऱ्यांच्या सोयीसाठी किंवा त्यांना आकर्षित करण्यासाठी बँकांनी आपले कर्ज देण्यावरचे व्याजदर कमी केले होते.  ज्या लोकांनी घरासाठी कर्ज घेतले होते त्यांचा ईएमआयचा भार थोडा हलका झाला. पण बँक चालायची असेल तर तिला डिपॉझिटर्सना त्याही पेक्षा कमी दरानेच व्याज द्यावे लागते. यामुळे बँकांच्या ठेवीवरील व्याजाच्या दरात कपात होत गेली होती. पण हे व्याज हेच ज्यांचे मुख्य उत्पन्न असेल अशा पेन्शनर लोकांना मात्र त्याचा जबर फटका बसला. एका बाजूला महागाई तर वाढतच होती आणि उत्पन्न मात्र कमी होत होते अशा दुहेरी कात्रीत ते सापडले. त्यांनी याची कल्पना केली नव्हती.


बँकांचे व्याजदर - १६

पूर्वीच्या काळी श्रीमंत कुटुंबाचे वर्णन करतांना "त्यांच्या सात पिढ्यांनी बसून खाल्ले तरी चालेल" असे सांगितले जात असे. त्यात अतीशयोक्ती होती, तसेच थोडे तथ्यही होते. माझ्या आजोबांच्या काळात खेड्यांमधल्या सगळ्या खाऊन पिऊन सुखी असलेल्या लोकांच्या मालकीच्या जमीनी होत्या आणि त्यावर त्यांची कुळे काम करून अन्नधान्य पिकवत असत. त्यातून आलेल्या धान्यातला एक हिस्सा कुळांना देऊन बाकीचे धान्य मालकांच्या कोठारात भरले जात असे. हे मालक लोक एका दृष्टीने पाहता 'बसूनच खात' असत. त्यातले काही उद्योगी लोक शेतात बांध बांधणे, विहिरी खणणे, ओसाड जमीन लागवडीखाली आणणे, झाडे लावणे अशा सुधारणा करून आपले उत्पन्न वाढवण्याचे काम करत. काही लोक वाचन, लेखन, पठण, प्रवचन, भजन, कीर्तन अशा कामांमध्ये वेळ सत्कारणी लावत असत, पण ती उत्पन्नाची साधने नव्हती. गावातले सुतार, लोहार, कुंभार, विणकर वगैरे बारा बलुतेदार धान्य घेऊन त्यांच्या सेवा आणि त्यांनी तयार केलेले सामान पुरवत असत. याव्यतिरिक्त त्या काळात इतर कुठले खर्च नव्हतेच. त्यामुळे प्रत्येक पिढीतले एकादे कुटुंब जन्मभर घरात बसून खाऊ शकत असे. एकाद्या घरात कुणी कर्ता पुरुष नसला तरी त्या कुटुंबातले वृद्ध आणि बायकामुले यांच्या अन्नाची तरतूद होत असे.

माझ्या वडिलांना घरात बसून खायचे नव्हते. त्यांनी कॉलेजात जाऊन शिक्षण घेतले आणि नोकरी धरली. त्यांच्या पिढीमधल्या अनेक लोकांनी हा मार्ग धरला. त्यामुळे शेतातल्या उत्पन्नाशिवाय त्यांचे पगार घरी यायला लागले. पण नोकरीसाठी परगावी रहावे लागल्यामुळे त्याबरोबर त्यांचे खर्चही वाढत गेले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर 'कूळ कायदा' अंमलात आला आणि "कसेल त्याची जमीन" या तत्वावर मालकांच्या  हातातून त्यांच्या शेतजमीनी गेल्या आणि नोकरीत मिळणारा पगार हेच त्यांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन झाले. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना 'घरात बसून खायची' सोय राहिली नाही. काही तरी कामधंदा किंवा नोकरी करून पैसे मिळवणे आवश्यक होऊन बसले. पण त्या काळात उच्च शिक्षणाच्या आणि नोकरीधंद्यांच्या अनेक नव्या वाटा उपलब्ध झाल्या आणि बहुतेक लोकांनी  त्यात चांगला जम बसवून प्रगति केली, आपले जीवनमान सुधारून घेतले. मिळणाऱ्या पगारातूनच चार पैसे वाचवून ते बँकेत ठेवायला लागले. अशा प्रकारे या नव्या जीवनपद्धतीत त्यांचा बँकांशी घनिष्ठ संबंध आला.


बँकांचे व्याजदर - १७

शेतीमधील उत्पन्न मुःख्यतः पावसावर अवलंबून असते, वेळेवर आणि हवा तेवढाच पाऊस पडला तर चांगले भरघोस पीक येते, नाहीतर ते कमी येते.जमीनीचा मालक तरुण आणि सुदृढ असला तरी किंवा तो म्हातारा आणि  अशक्त झाला तरी त्याला मिळायचे असेल तेवढेच उत्पन्न मिळते. दुकानदारही वयस्क झाला तरी काही वेळ दुकानदारीमध्ये घालवतो. शेती आणि व्यापार यात वयाचे फारसे बंधन नसते, मालक तो अखेरपर्यंत मालकच राहतो आणि त्याला उत्पन्न मिळत राहते.  पण नोकरीमध्ये मात्र बहुतेक ठिकाणी एक वय गाठल्यानंतर सेवानिवृत्तीची वेळ येते. त्यानंतर पगार मिळणे पूर्णपणे थांबून जाते, तरीही त्याला पुढे उरलेले आयुष्यभर घरी बसून खायचे असतेच.

इंग्रज सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये निवृत्तिवेतनाची सोय करून ठेवली होती आणि केंद्र व राज्य सरकारांनी ती अजूनपर्यंत तरी पुढे चालू ठेवली आहे. पुढे ती बंद होणार असल्याचे समजते.  पण आहे तोपर्यंत तिचा बऱ्यापैकी आधार आहे.  ज्यांना पेन्शन मिळणारच नसते अशा लोकांना मात्र पुढील आयुष्यासाठी आधीपासून नियोजन करावे लागते. सुरुवातीपासूनच भविष्यासाठी काही बचत करून ते पैसे बँकेमध्ये साठवून ठेवत गेलो तर रिटायर होईपर्यंत खूप मोठी गंगाजळी तयार होईल, शिवाय भविष्यनिर्वाह निधि (प्रॉव्हिडंट फंड) आणि  ग्रॅच्युइटी मिळणार असतात ते पैसे बँकेत ठेवले तर त्यावर मिळणाऱ्या व्याजामधून आपण सगळे उर्वरित आयुष्य आरामात घालवू अशी काही लोकांची समजूत असते. काही लोक असे सुखेनैव रहात असल्याचे दिसतेही, पण यात काही अनिश्चिततासुद्धा असते हे आपण मागील भागात पाहिले आहे . 

मी याआधीच्या भागांमध्ये लिहिल्याप्रमाणे वाढती महागाई किंवा इन्फ्लेशनमुळे पैशाची किंमत सारखी कमी कमी होत जाते.  आतापर्यंत तरी बँकेत मिळणाऱ्या व्याजाचे दर महागाईमधील दर वर्षी होत आलेल्या वाढीच्या दरांपेक्षा कमीच राहिले आहेत असेही मी पाहिले आहे आणि यात फरक पडेल असे मला वाटत नाही. त्यामुळे बँकेत ठेवलेल्या पैशांना  दहा बारा वर्षांनंतर पहिल्याइतकी किंमत रहात नाही. ते पैसे शेअर्समध्ये गुंतवले तर त्यांचे भाव वाढत जाऊन गगनाला भिडण्याचीही शक्यता असते किंवा ते कोसळून शून्यावरही येऊ शकतात.  तिथे डोळसपणे गुंतवणूक करणे आणि सतत बाजारावर लक्ष ठेऊन योग्य वेळी ते विकून टाकणे हे ही महत्वाचे असते.

मेडिकल शास्त्रांमध्ये होत असलेल्या प्रगतीमुळे निरनिराळ्या तपासण्या आणि उपचार यामधून आता आयुर्मान वाढत चालले आहे. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य किती असेल आणि त्यातली किती वर्षे आपण धडधाकट राहू हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे नेहमीच्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही जोपर्यंत शक्य असेल तोवर काही तरी हालचाल करून चार पैसे मिळवत आणि ते साठवत राहणे शहाणपणाचे असते आणि बरेच लोक ते करतांना दिसतात.


(समाप्त)


*******************************************************************************