Tuesday, February 03, 2026

पंच (PUNCH) प्रपंच

 मी तेरा वर्षांपूर्वी लिहिलेल्या पंचलाइन या लेखाचा विस्तार करून आणि त्यात चित्रे टाकून तो इथे दिला आहे. या कामात थोडी ए आयची मदतही घेतली आहे

पंच (PUNCH) प्रपंच  - १

पंचमहाभूते, पंचप्राण, पंचपरमेश्वर, पंचम, पंचांग वगैरेंमधल्या पाच या अर्थाने येणाऱ्या पंचांचा प्रपंच मला या लेखात करायचा नसून इंग्रजी भाषेमधल्या 'पंच' (PUNCH) या शब्दाचा थोडासा पंचनामा करायचा विचार आहे. मी हा शब्द पहिल्यांदा ऐकला तेंव्हा मी प्राथमिक शाळेत शिकत होतो. माझ्या मोठ्या भावासोबत गणपतीच्या मखराची सजावट करतांना त्यावर काढलेल्या एका डिझाईनला मी ठिपक्याठिपक्यांची बॉर्डर काढली. पण ते ठिपके नीट वर्तुळाकार आले नाहीत आणि शिवाय ते एकसारखे न आल्यामुळे चित्राची शोभा वाढण्याऐवजी कमी झाली असे वाटले. ते ठिपके कसे झाकता येतील असा विचार करतांना माझ्या भावाला एक युक्ती सुचली. 


त्याने वडिलांच्या कपाटातून पकडीसारखे दिसणारे एक हत्यार आणले आणि त्यात एक कागद सरकवून जोराने दाबले. कट्ट असा आवाज आला आणि कागदाला लहानसे गोल भोक पडले आणि पकड सैल करताच तेवढ्या आकाराची कागदाची चकती बाहेर पडली. ते पाहून मला खूप मजा वाटली आणि निरनिराळ्या रंगाच्या कागदांना त्या यंत्राने चावे घेऊन मी खूप रंगीबेरंगी चकत्या पाडल्या. त्यातली एक एक चकती गोंदाने मखराला चिकटवून आम्ही ते खूप सजवले. कोणाला न विचारता त्या औजाराला हात लावला आणि कागदांची नासाडी केली म्हणून आम्ही बोलणी खाल्ली, पण एक नव्या प्रकारची सजावट केल्याचे समाधान मिळाले आणि त्याचे थोडे कौतुकसुध्दा झाले. त्या औजाराला 'पंच' म्हणतात असे समजले, पण कागदाला एका वेळी फक्त एकच भोक पाडणाऱ्या यंत्राला पंच असे का म्हणायचे हे समजले नाही आणि ते समजून घेण्याचा प्रयत्नही करावा असे तेंव्हा वाटले नाही. खरे तर 'पंच' हा एक इंग्रजी भाषेतला शब्द आहे हे सुध्दा मला त्या वेळी माहित नव्हते. माझ्या दृष्टीने ते भोक पाडणे मुळी महत्वाचे नव्हतेच, त्यातून पडलेल्या टिकल्या माझ्या उपयोगाच्या होत्या. माझ्यासाठी ते कागदाला छिद्र पाडण्याचे यंत्र नसून कागदाच्या टिकल्या तयार करण्याचे साधन होते. त्या साधनाला 'सिंगल पंच' असे म्हणतात आणि बरेच कागद एकत्र बांधून ठेवण्यासाठी त्यांच्या वरच्या कोपऱ्यात त्या पंचने भोके पाडली जात असत. कदाचित त्या काळात स्टेपलर हा प्रकार उपलब्ध नसावा म्हणून कागदांना दोऱ्याने बांधून ठेवत असतील. आमच्या घरी आलेली सगळी पत्रे आम्ही त्यांना भोक पाडून एका मोठ्या वाकड्या तारेत अडकवून ठेवत असू. एकाच वेळी अनेक कागदांना ठराविक अंतरावर  दोन गोल भोके पाडणारे 'डबल पंच' सुध्दा असते, त्याचा उपयोग ऑफिसमधल्या कागदांना फाईलमध्ये अडकवून ठेवण्यासाठी होतो वगैरे ज्ञान मला त्यानंतर कित्येक वर्षांनंतर झाले. आजकाल पेपरलेस ऑफिसे झाल्यामुळे ऑफिसांमध्ये फाइलींची कॅबिनेटसुद्धा नसतात, तिथे डबल पंचही ठेवली जात नसतील.

पंच (PUNCH) प्रपंच  - २

इंग्लिश भाषा शिकतांना 'पंच' म्हणजे 'जोराचा ठोसा मारणे' हा अर्थ समजला. 'चलतीका नाम गाडी' सिनेमातल्या अशोककुमारापासून ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणाऱ्या मेरी कोमपर्यंत अनेक मुष्टीयोध्द्य़ांनी मारलेले जबरदस्त ठोसे आणि त्या खेळामधली गुद्दागुद्दी सिनेमात किंवा टीव्हीवर पाहतांना 'पंच' या शब्दाचे प्रात्यक्षिक पहायला मिळाले. या बॉक्सर लोकांना सराव करण्यासाठी डाव्याउजव्या हातांनी एका मागोमाग एक ठोसे भराभर मारून पाहणे आवश्यक असते, पण त्यांच्यासाठी आपले थोबाड सुजवून घ्यायला कोण तयार होईल?

 त्यांचे ठोसे खाण्यासाठी एक पंचिंग बॅग समोर टांगून ठेवतात आणि हे वीर त्यावर 'दे दणादण' करतात. ही पंचिंग बॅग सहसा चामड्याची, सिंथेटिक लेदरची किंवा कॅनव्हासची बनलेली असते आणि त्यामध्ये वाळू, कापडाचे तुकडे किंवा धान्य भरलेले असते. पंचिंग बॅगवर सराव केल्यामुळे शरीराचा वरचा भाग, हात आणि खांदे मजबूत होतात,  तसेच वजन कमी करण्यास मदत होते. शिवाय रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा मानसिक तणाव कमी करण्यासाठी पंचिंग बॅगवर सराव करणे प्रभावी ठरते आणि पंच मारण्याचे तंत्र आणि ताकद सुधारते, जे स्वसंरक्षणासाठी उपयुक्त ठरते.

यावरून 'पंचिंग बॅग' असा एक वाक्प्रचार तयार झाला आहे. एकादा गरीब बिचारा सोशिक माणूस भेटला तर इतर लोक त्याच्यावर डाफरून आपला राग काढून घेतांना त्याचा वापर 'पंचिंग बॅग' सारखा करतात. 'पंचिंग बॅग' (Punching Bag) हा शब्द जेव्हा एखाद्या व्यक्तीसाठी वापरला जातो, तेव्हा तो अलंकारिक किंवा प्रतिकात्मक अर्थाने वापरला जातो. याचा सोपा अर्थ असा की, अशी व्यक्ती जिचा वापर इतर लोक आपला राग काढण्यासाठी किंवा छळण्यासाठी करतात. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचा राग, चिडचिड किंवा अपयश दुसऱ्यावर काढते, तेंव्हा ज्याच्यावर हा राग काढला जातो त्याला 'पंचिंग बॅग' म्हटले जाते. ती व्यक्ती समोरच्याचे बोलणे किंवा वागणूक निमूटपणे सहन करते. जर एखाद्या ऑफिसमध्ये बॉस किंवा वरिष्ठ कर्मचारी त्यांच्या चुकांचे खापर वारंवार एकाच कनिष्ट कर्मचाऱ्यावर फोडत असतील किंवा त्याला सतत बोलत असतील, तर त्या कर्मचाऱ्याला ऑफिसची 'पंचिंग बॅग' म्हटले जाते. राजकारणात जेव्हा एखादा पक्ष किंवा नेता सर्व समस्यांसाठी दुसऱ्या एखाद्या नेत्याला किंवा पक्षाला सतत जबाबदार धरतो आणि त्यांच्यावर टीका करतो आणि तो त्याला प्रत्युत्तर देत नसेल तर, तेव्हा त्या नेत्याला 'राजकीय पंचिंग बॅग' म्हटले जाते. थोडक्यात सांगायचे तर ज्याप्रमाणे जिममधील पंचिंग बॅगवर कोणीही येऊन प्रहार करू शकतो आणि ती बॅग काहीही न बोलता ते ठोसे सहन करते, त्याचप्रमाणे समाजात जी व्यक्ती इतरांचा अन्याय, राग किंवा टोमणे निमूटपणे सहन करते, तिला 'ह्युमन पंचिंग बॅग' (Human Punching Bag) असे संबोधले जाते. आपल्याला अशा पंचिंग बॅग आजूबाजूला दिसत असतात आणि कधीकधी त्यांची कींव येते. आपण मात्र संधी मिळते आहे म्हणून एखादा पंच (ठोसा) मारून घ्यायचा मोह टाळायला हवा.

पंच (PUNCH) प्रपंच  - ३
मला मेकॅनिकल इंजिनियरिंग शिकत असतांना वस्तूंना आकार देण्यासाठी (मेटल वर्किंगमध्ये) 'डाय आणि पंच' या अवजारांचा वापर करणे शिकायला मिळाले. तापवलेल्या लोखंडाच्या गोळ्यापासून हातोडा, क्रँकशाफ्ट यासारख्या विशिष्ट आकारांच्या वस्तू किंवा पातळ पत्र्यामधून चमचा, झाकण अशासारख्या वस्तू तयार करण्यासाठी त्यांना डाय आणि पंच या जोडीमध्ये ठेवून जोरात ठोकले जाते. एका पत्र्यामधून लहान लहान आकाराच्या अनेक वस्तू काढण्यासाठी किंवा त्या पत्र्याला विविध आकाराची अनेक छिद्रे पाडून त्याची जाळी किंवा चाळण बनवण्यासाठी पंचिंग मशीने असतात. कागदाला भोके पाडायच्या पंचचेच हे मोठे अवतार असतात. कागदाला भोके पाडायचे काम हाताच्या बोटांच्या जोराने करता येते, पण धातूंना आकार देण्यासाठी खूप शक्ती लागते म्हणून कारखान्यामधील पंचवर दाब देण्यासाठी यांत्रिक हातोडे किंवा हायड्रॉलिक सिलिंडर्स असतात. मोटारीच्या किंवा दुचाकीच्या मुख्य आकारांना सगळ्या बाजूने गोलाई दिलेली असते. लोखंडाच्या पत्र्यांना मोठमोठ्या डाय आणि पंच यामधून दाब देऊन वाकवून हे आकार तयार केले जातात. एका डायपंचमधून शेकडो पार्ट तयार होत असतात आणि ते तंतोतंत एकासारखे एक असतात. म्हणूनच आपल्याला कारचे किंवा स्कूटरचे मॉडेल त्यांच्या बाह्य आकारावरूनच पटकन समजते. अर्थातच या सगळ्या कामांमध्ये 'पंच' म्हणजे जोर लावून ठोकणे अथवा दाबणे येते.


डाय आणि पंच (Die and Punch) हे प्रामुख्याने मॅन्युफॅक्चरिंग (उत्पादन) क्षेत्रात वापरले जाणारे अत्यंत महत्त्वाचे टूल्स आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर, एखाद्या धातूच्या शीटला किंवा वस्तूचा ठराविक आकार कापण्यासाठी किंवा देण्यासाठी यांचा जोडीने वापर होतो. पंच (Punch) हा वरचा भाग असतो जो दाब देण्याचे काम करतो आणि डाय (Die): हा खालचा भाग असतो ज्यामध्ये हवा तो आकार कोरलेला असतो. जिथे मोठ्या प्रमाणात (Mass Production) आणि अचूक आकारात वस्तू बनवायच्या असतात, तिथे डाय आणि पंचचा वापर अनिवार्य असतो. यामधून वाहनांचे दरवाजे, बोनेट आणि इतर पत्र्यांचे भाग, इंजिनाचे भाग किंवा हातोडा, रेंच, स्पॅनर यासारखी औजारे तर बनवतातच, पण टाकसाळीमध्ये पाडली गेलेली नाणी आणि औषधांच्या पावडरपासून तयार केलेल्या गोळ्यासुद्धा पंच आणि डायमधून तयार केल्या जातात.

पंच (PUNCH) प्रपंच  - ४
मी नोकरीला लागल्यानंतर अनेक कारखान्यांना भेटी देतांना त्यांच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी (मेन गेटपाशी) असलेले टाईम ऑफीस दिसायचे. पूर्वीच्या काळी तिथे काम करणारे टाईमकीपर प्रत्येक कामगाराच्या नावाचे एक कार्ड बनवून ती सगळी कार्डे एका बोर्डावर लावून ठेवत असत. प्रत्येक कामगाराने कारखान्यात प्रवेश करतांना आणि कारखान्याच्या बाहेर पडतांना आपापले कार्ड तिथल्या पंच कार्ड मशीनवर पंच करून घ्यावे लागत असे. 


रेल्वे तिकीटावर छापतात त्याप्रमाणे त्या कार्डावर तारीख, वेळ वगैरे छापले जात असे. कामगारांच्या शिफ्टची वेळ संपून गेल्यानंतर टाईमकीपर सर्व कार्डे पाहून कोण कोण कामावर आले, वेळेवर आले की उशीराने आले वगैरे माहिती ऑफीसला कळवीत असत. महिनाअखेर कर्मचाऱ्याने किती दिवस काम केले, किती दिवस सुटी घेतली आणि किती ओव्हरटाईम (OT) केला, याची माहिती टाईम ऑफिसकडूनच पगार विभागाला दिली जात असे आणि त्यानुसार कामगाराला पगार मिळत असे. पूर्वीच्या काळी कर्मचाऱ्यांची उपस्थिती हजेरीपटावर (Musters) सही करून घेतली जात असे. परंतु, कामात पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी 'कार्ड पंचिंग' पद्धत सुरू झाली.
आता सगळ्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक झाल्या असल्यामुळे कामगार आपल्याकडे असलेले स्मार्ट आयडेंटिटी कार्ड तिथल्या यंत्राला फक्त दाखवतात किंवा स्वाइप करतात, ज्यामुळे त्यांची वेळ आपोआप सिस्टिममध्ये नोंदवली जाते.  काही ठिकाणी तर फक्त हाताचा आंगठा उमटवून किंवा आपला चेहेरा दाखवून काम होते. ते पाहून त्या कामगाराच्या येण्याजाण्याची वेळ वगैरे सगळी माहिती आपोआप कारखान्यातल्या मुख्य संगणकात नोंदली जाते. ते काम करण्यासाठी आता वेगळा टाईमकीपर लागत नाही. आता ही डिजिटल प्रक्रिया अधिक प्रचलित असली तरीसुध्दा या प्रणालीला अजूनही  व्यवहारात अजूनही 'पंचिंग' असेच म्हटले जाते. 
अगदी अलीकडच्या काळात म्हणजे कोविडनंतर वर्क फ्रॉम होम सुरू झाले. तिथे मात्र कांप्यूटरवर लॉग इन लॉग आउट केले जाते. त्यामुळे त्यांच्या बाबतीत हे 'पंचिंग' आता कालबाह्य झाले आहे.

पंच (PUNCH) प्रपंच  - ५
मोठ्या हॉटेलात किंवा पार्टीजमध्ये दिल्या जाणाऱ्या पेयांमध्ये अनेक वेळा 'फ्रूटपंच' या पेयाचा समावेश असतो. यात फळांना ठोसे मारून किंवा ठेचून ते काढले जाते की काय असे वाटेल. या पंचमध्ये मद्यार्कयुक्त पेयेसुध्दा असतात, त्यात कशाला ठोकले असेल? ही बहुतेक पेये कॉकटेल्स म्हणजे मिश्रपेये असतात. कदाचित याच्या नावाचा उगम संस्कृतमधल्या पंचवरून पाच पेयांचे मिश्रण असा झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण बहुधा त्यातल्या मद्यार्कामुळे थोडीसी किक येते, त्यालाच पंच म्हंटले असेल.


फ्रूट पंचची काही खास वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
फळांचे मिश्रण: यात संत्री, अननस, सफरचंद, द्राक्षे आणि लिंबू अशा विविध फळांच्या रसांचा वापर केला जातो.
फळांचे तुकडे: पेयाची चव आणि सौंदर्य वाढवण्यासाठी त्यात स्ट्रॉबेरी, टरबूज किंवा अननसाचे बारीक तुकडे टाकले जातात.
गोडवा आणि थंडावा: चवीनुसार साखर किंवा मध वापरले जाते आणि भरपूर बर्फ टाकून ते थंड केले जाते.
तयार करण्याची कृती: एका मोठ्या भांड्यात सर्व फळांचे रस एकत्र करावेत. त्यात चिरलेली फळे आणि बर्फ टाकावा. सर्व्ह करण्याच्या अगदी थोडा वेळ आधी त्यात सोडा किंवा स्प्राइट मिसळावे जेणेकरून त्याचा फसफसाट टिकून राहील.

पंच (PUNCH) प्रपंच  - ६
पन्नास साठ  वर्षांपूर्वी भारतातील उद्योगव्यवसायात काँप्यूटरचा वापर सुरू झाला तेंव्हा ते काम फक्त मेन फ्रेम काँप्यूटरवर होत असे. आज सर्वत्र दिसणारे पीसी, लॅपटॉप,  टॅब्लेट, हार्ड ड्राइव्ह, फ्लॅश ड्राइव्ह, सीडी, डीव्हीडी, डाँगल, पेन्ड्राइव्ह वगैरेतले काहीसुध्दा त्या काळात नव्हते. तेंव्हा काँप्यूटरशी संवाद सांधणारा की बोर्डसुद्धा नव्हता. संगणकाला माहिती पुरवण्यासाठी पंच  केलेल्या कार्डांचा उपयोग केला जात असे. त्यासाठी एबीसीडी सारखी अक्षरे आणि १२३४ सारखे अंक यांसाठी ठरलेल्या कोडनुसार एका कार्डावर निरनिराळ्या अंतरावर चौकोनी आकाराचे लहान लहान स्लॉट्स पाडत असत. इनपुट म्हणून अशा कार्डांचा गठ्ठा काँप्यूटरच्या कार्ड रीडरमध्ये घातल्यावर त्यातले एक एक कार्ड त्यातल्या प्रकाशझोतात आले की छिद्रांमधून पलीकडे गेलेल्या प्रकाशावरून किंवा त्यामधून गेलेल्या विद्युत प्रवाहामधून ती माहिती संगणकाला मिळे आणि त्याचे सॉर्टिंग, बेरजा, वजाबाक्या वगैरे करून अखेर प्रिंटआउटमधून औटपुट मिळत असे. त्यावेळी आमच्या ऑफीसात काँप्यूटर आला नव्हता आणि आमचे डेटाबेसचे संगणकीय काम टीआयएफआर मध्ये होत असे. पण मला त्याची जुजबी माहिती होती. मी अशी काही पंच केलेली कार्डे पाहिली होती.


१९५० ते १९७० च्या दशकात आयबीएम (IBM) सारख्या कंपन्यांचे संगणक चालवण्यासाठी मुख्यत्वे या कार्डांचा वापर होत असे. सुरुवातीला बँका आणि विमा कंपन्यांमध्ये ग्राहकांचा डेटा साठवण्यासाठी आणि हिशोब ठेवण्यासाठी याचा वापर सुरू झाला. पंच कार्ड हे साधारणपणे एका कडक कागदाचे कार्ड असायचे. त्यावर माहिती भरण्याची पद्धत खालीलप्रमाणे होती:
डेटा पंचिंग (Punching): एका विशिष्ट यंत्राद्वारे (Keypunch Machine) कार्डवर ठराविक ठिकाणी छिद्रे (Holes) पाडली जात. प्रत्येक छिद्र एका विशिष्ट अक्षराचे किंवा अंकाचे प्रतीक असे.  कोडिंग (Coding): छिद्र पाडलेले स्थान म्हणजे '१' (On) आणि छिद्र नसलेले स्थान म्हणजे '०' (Off) असा हा बायनरी कोडचा प्राथमिक प्रकार होता. ही कार्डे 'कार्ड रीडर' मशीनमध्ये टाकली जात. मशीनमधील सेन्सर्स किंवा ब्रश त्या कार्डावरील माहिती वाचून ती माहिती संगणकाकडे पाठवत असत आणि संगणक त्या माहितीनुसार गणिते किंवा वर्गीकरण करत असे. एका कार्डवर साधारणपणे ८० अक्षरे किंवा आकडे साठवता येत असत. प्रत्येक डेटाबेससाठी अशा कार्डांचा गठ्ठा तयार केला जात असे. 

पंच (PUNCH) प्रपंच  - ७

त्या काळात मी एकदा माझ्यापेक्षा सर्वच दृष्टीने फार मोठ्या असलेल्या माझ्या नात्यातल्या एका बुजुर्ग व्यक्तीला भेटायला गेलो होतो. समाजसेवा किंवा देशकार्यासाठी ते सारखे भ्रमण करत असत आणि घरी आलेल्या वेळीसुध्दा त्यांना भेटायला आलेल्या लोकांचा वेढा त्यांना पडलेला असे. मी त्यांच्याकडे गेलो होतो त्यावेळीसुध्दा त्यांचा दरबार भरलेलाच होता. मला दारात पाहताच त्यांनी हाक मारून बोलावले आणि समोर बसवून घेतले. चहापान करता करता हवापाणी, तत्कालीन घटना वगैरे सामान्य विषयावर त्यांच्या गप्पागोष्टी चालल्या होत्या. या वार्तालापात बहुतेक वेळा फक्त तेच बोलत होते, त्यांनी विनोद केला की इतरांनी खिदळायचे, ते गंभीर झाले की गंभीर चेहरा करून "आता कसे होईल?, आता काय करायचे?" वगैरे म्हणायचे, त्यावर त्यांनी काही मार्गदर्शन केले की सगळ्यांनी माना डोलवायच्या असे चालले होते. त्या वेळातच आमचे आणखी एक नातेवाईक आत आले, अत्यंत आदरपूर्वक रीतीने एक आमंत्रणपत्रिका आणि अक्षता त्या गृहस्थांच्या हातात ठेऊन म्हणाले, "आपल्या --- रावांच्या मुलाचे लग्न ठरले आहे. खरे तर आमंत्रण देण्यासाठी ते स्वतःच येणार होते, पण आता त्यांना लांबचा प्रवास झेपत नाही म्हणून त्यांनी हे काम माझ्याकडे सोपवले आहे. तरी आपण सर्वांनी या लग्नाला अवश्य यावे."
पत्रिका उघडून पाहता पाहता नेताजींनी विचारले, "हा नवरा मुलगा म्हणजे लहान असतांना आपल्याकडे यायचा तो चंदूच ना? आता तो काय करतो आहे?"
"तो एलआयसीम्ध्ये पंचऑपरेटर आहे."
"म्हणजे...? " असा क्षणभर स्वतःशीच विचार करत आणि इतर कोणालाही त्यावर बोलण्याची संधी न देता ते पटकन उद्गारले, "त्या एलआयसीच्या नोटिशींना दोन्ही बाजूने रांगेत भोके पाडलेली असतात ना? ते करायचे काम असेल."
पंच ऑपरेटर असलेला तो नवरदेव काय काम करतो हे बहुधा त्या नातेवाईकांना ठाऊक असेलही, पण तिथे ते त्यावर काही बोलले नाहीत. मी काही बोलू शकलो असतो पण त्यावर "एवढ्या मोठ्या माणसाला शहाणपणा शिकवणारा हा चोंबडा कोण आला?" असेच दरबारातल्या सर्वांना वाटले असते म्हणून मीही गप्प राहिलो. त्यानंतर दोन तीन वर्षांनी मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे गेलेलो असतांना योगायोगाने कुणाच्या तरी बोलण्यामधून त्याच मुलाचा विषय निघाला.
"म्हणजे एलआयसीच्या नोटिशींना भोके पाडतो तोच ना?" ते पटकन उद्गारले. त्यांची स्मरणशक्ती तल्लख होती आणि त्यांनी पूर्वी करून घेतलेला पूर्वग्रह अजून सुटला नव्हता. पंच ऑपरेटरचे काम काय असते? हे मधल्या काळात त्यांना कोणी सांगितलेले दिसत नव्हते आणि काँप्यूटर प्रिंटआउटच्या कागदांना दोन्ही बाजूने भोकांच्या रांगा कशासाठी असतात? किंवा ती भोके कुठल्या कारखान्यात पाडली जातात? वगैरे माहितीही त्यांना कुणीच दिली नव्हती.
"आता तो ब्रँच मॅनेजर झाला आहे." हे उत्तर थोडे धक्कादायक होते. कागदाला भोके पाडायचे साधे काम करणारा मजूर एकदम ब्रँच मॅनेजर कसा झाला?
"पुरुषस्य भाग्यम् देवो न जानाति .." किंवा "हल्लीच्या सरकारच्या राज्यात काय काय होईल काही सांगता येत नाही." अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दरबारी मंडळींमधून आल्या.
आता कार्डपंचिंगचे कामही शिल्लक राहिले नाही. त्यामुळे यातला विनोदही कुणाला समजणार नाही.

पंच (PUNCH) प्रपंच  - ८

व्यंगचित्रांना वाहून घेतलेले 'पंच' (Punch) किंवा 'द लंडन चॅरिव्हरी' (The London Charivari) या नावाचे एक ब्रिटीश विनोद आणि उपरोधाचे (satire) अत्यंत प्रभावशाली साप्ताहिक होते. १८४१ ते २००२ या दीर्घ कालावधीत या मासिकाने केवळ ब्रिटनवरच नाही, तर जगातील विनोदी साहित्यावर मोठी छाप पाडली. आज आपण ज्या अर्थाने 'कार्टून' (व्यंगचित्र) हा शब्द वापरतो, तो सर्वप्रथम 'पंच' मासिकाने रूढ केला.'पंच'ने सरकारी कामांमधील उणिवा दाखवण्यासाठी उपरोधाने हा शब्द वापरायला सुरुवात केली. 'पंच' हे केवळ विनोदाचे साधन नव्हते, तर तो व्हिक्टोरियन काळापासून २० व्या शतकापर्यंतच्या ब्रिटीश समाजजीवनाचा आरसा होता. यात ब्रिटीश राजवटीवरही अनेकदा मार्मिक भाष्य केले जात असे.  राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधला ढोंगीपणा व्यंगचित्रामधून दाखवतांना त्यांनी केलेल्या पंचिंगमुळे ढोंगीपणाचे अनेक फुगे फुटले होते. या मासिकाने जागतिक व्यंगचित्रकलेच्या इतिहासात काही अत्यंत अजरामर चित्रे दिली होती. या मासिकातील चित्रांची शैली ही बारीक रेषांची आणि सखोल अर्थाची (Detailed hatching) असे, ज्याचा प्रभाव आजही अनेक व्यंगचित्रकारांवर दिसून येतो. लंडनच्या 'पंच' (Punch) मासिकाच्या लोकप्रियतेनंतर भारतातही उपरोधिक आणि विनोदी साहित्याची लाट आली. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात 'पंच'च्या धर्तीवर जवळपास ७० हून अधिक छोटी-मोठी साप्ताहिके आणि मासिके सुरू झाली होती.
हिंदु पंच हे मराठीतील पहिले 'पंच' मानले जाते. १८७० ते १९०९ या काळात हे साप्ताहिक मुंबईतून प्रकाशित होत असे. या नियतकालिकाने मराठी साहित्यात विनोदी आणि उपरोधिक पत्रकारितेची सुरुवात केली. यात केवळ विनोदच नव्हते, तर सामाजिक आणि राजकीय विषयांवर मार्मिक भाष्य असायचे.  हे मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि धाडसी साप्ताहिक होते. लंडनच्या 'पंच' मासिकाच्या धर्तीवर भारतात जे अनेक प्रयोग झाले, त्यातील हे सर्वात प्रभावशाली मराठी प्रकाशन ठरले. श्री.धोंडो काशिनाथ फडके हे याचे सर्वात प्रसिद्ध संपादक होते. त्यांच्या धारदार लेखणीमुळे हे साप्ताहिक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. ब्रिटीश सरकारचे अन्यायकारक कायदे, नोकरशाहीचा अहंकार आणि तत्कालीन समाजातील अनिष्ट प्रथा यांवर हे साप्ताहिक सडकून टीका करत असे. पण त्याकाळी ब्रिटीश सरकारचे कडक सेन्सॉरशिप कायदे होते. त्यामुळे थेट टीका करण्याऐवजी 'हिंदू पंच'मध्ये रूपकात्मक कथा किंवा संवादांचा वापर केला जाई. हे साप्ताहिक प्रामुख्याने लोकमान्य टिळक यांच्या विचारांचे समर्थक मानले जाई. भारतीयांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करावा आणि आपल्या हक्कांबद्दल जागृत राहावे, यासाठी हे साप्ताहिक सातत्याने लिहीत असे. 'हिंदू पंच'ची टीका ब्रिटीश सरकारला इतकी बोचू लागली की, १९०९ मध्ये संपादक धोंडो काशिनाथ फडके यांच्यावर राजद्रोहाचा (Sedition) खटला भरण्यात आला. त्यांच्या काही लेखांमुळे जनतेत असंतोष पसरत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. या खटल्यात फडके यांना तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. संपादकांना अटक झाल्यामुळे आणि सरकारी दडपशाहीमुळे १९०९ मध्ये हे ऐतिहासिक साप्ताहिक बंद पडले.

जगप्रसिद्ध उर्दू कवी अकबर इलाहाबादी यांनी असे सांगितले होते: "खींचो न कमानों को न तलवार निकालो, जब तोप मुकाबिल हो तो अख़बार निकालो।" याचा अर्थ जेव्हा शत्रू समोरून तोफांनी हल्ला करत असेल, तेव्हा धनुष्यबाण किंवा तलवार काढून उपयोग नाही; अशा वेळी 'वृत्तपत्र' (अखबार) काढा. म्हणजेच, शस्त्राच्या लढाईपेक्षा लेखणीची आणि विचारांची लढाई अधिक प्रभावी असते. अकबर इलाहाबादी हे अवध पंच या नियतकालिकाचे एक मुख्य आधारस्तंभ आणि लेखक होते.

नंतरच्या काळातही या अनेक भाषांमधील पंचांवरून प्रेरणा घेऊन शंकर्स वीकली आणि मार्मिक यासारखी अनेक साप्ताहिके देशोदेशी निघाली.  मार्मिककर्ते माननीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांमध्ये जसा पंच होता तसाच किंबहुना त्याहूनही जबरदस्त पंच त्यांच्या लेखनात आणि वक्तृत्वातही होता. 'मार्मिक' हे साप्ताहिक महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. विशेषतः मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारे हे एक प्रभावी माध्यम ठरले. 'मार्मिक'चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची व्यंगचित्रे. लंडनच्या 'पंच' मासिकाप्रमाणेच, बाळासाहेबांनी रेषांच्या माध्यमातून राजकारण्यांवर आणि सामाजिक विसंगतीवर ओढलेले आसूड प्रचंड लोकप्रिय झाले. बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांच्या मालिकेला 'फटकारे' म्हंटले जाई, जे आजही राजकीय व्यंगचित्रकलेचा आदर्श मानले जातात. 

पंच (PUNCH) प्रपंच  - ९

लेखनामध्ये, विशेषतः विनोदामध्ये किंवा किस्सा सांगतांना पंचलाईन फार महत्वाची असते. पहिल्या सगळ्या मजकुरामधल्या अर्थाला शेवटच्या एका ओळीने एकदम वेगळे वळण लागते आणि त्यातून हास्याचा स्फोट होतो. पंचलाइन (Punchline) म्हणजे कोणत्याही विनोदाचा, कथेचा किंवा संवादाचा तो शेवटचा भाग, जो श्रोत्यांना हसवतो किंवा थक्क करतो. एखाद्या उत्कृष्ट पंचलाइनमध्ये संपूर्ण संभाषणाचा रोख बदलण्याची ताकद असते. एखादा जोक कितीही लांब असला, तरी लोक वाट पाहतात ती शेवटच्या त्या एका वाक्याची! ते वाक्य म्हणजेच 'पंचलाइन'. साध्या शब्दांत सांगायचे तर, पंचलाइन म्हणजे "अनपेक्षित वळण". जेव्हा श्रोत्यांना वाटते की गोष्ट एका दिशेला जात आहे, तेव्हा अचानक पंचलाइनच्या माध्यमातून तिला वेगळे वळण दिले जाते आणि तिथेच विनोदाचा स्फोट होतो. पंचलाइन नेहमी अनपेक्षित असावी लागते. जर श्रोत्यांनी शेवट आधीच ओळखला, तर तो विनोद फ्लॉप ठरतो. विनोदात 'टायमिंग'ला खूप महत्त्व आहे. योग्य वेळी, योग्य शब्दांत मारलेली पंचलाइनच प्रभावी ठरते. पंचलाइन जितकी छोटी आणि टोकदार असेल, तितकी ती जास्त लक्षात राहते. पंचलाइनचे उपरोधिक (Sarcastic), शाब्दिक कोट्या (Puns), स्वयं-उपहास (Self-deprecating) इत्यादि विविध प्रकार आहेत.

अनपेक्षित वळण देणाऱ्या पंचलाइनचे एक उदाहरण खाली दिले आहे.
ती धावत धावत जिने चढून गच्चीवर गेली. तिला धाप लागल्यामुळे गच्चीवर गेल्यावर ती उभी राहिली. तिच्या पाठोपाठ तोही धावत वर गेला. त्यांनी भराभरा शर्ट, पँट काढली, साडी, ब्लाऊज, पेटीकोट आणि इतर सगळे कपडेही काढले.
.
.
.
दोरीवर वाळत घातलेले सारे कपडे घेऊन पावसाची सर यायच्या आत दोघेही खाली उतरले.

पंचलाईन अशी असते.

(समाप्त)


Tuesday, January 20, 2026

भारतीय अवकाश संशोधनाचा इतिहास आणि यशोगाथा

आज अवकाशसंशोधनाच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या देशांमध्ये भारताचे नाव घेतले जाते, पण सुरुवातीपासून आजवर केल्या गेलेल्या कामगिरीचा याचा इतिहास मनोरंजक तसाच चित्तथरारक आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर प्रगत देशांमध्ये अणुशक्ती आणि अवकाश यावर जोराने संशोधन सुरू झाले होते. डॉ.होमी भाभा आणि डॉ.विक्रम साराभाई या द्रष्ट्‍या शास्त्रज्ञांच्या कुशल नेतृत्वाखाली स्वतंत्र भारतानेही या विषयांवरील संशोधन सुरू केले. इ.स.१९४८ साली  डॉ.भाभा यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची (Atomic Energy Commission) स्थापना करण्यात आली आणि त्याच काळात डॉ.साराभाई यांनी अहमदाबाद इथे फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (PRL)स्थापन करून तिथे अध्यापन आणि संशोधन सुरू केले. त्यांनी अणुशक्ती विभागाच्या सहकार्याने १९५४मध्ये काश्मीरातील गुलमर्ग इथे हाय आल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी स्थापन केली. १९४७ मध्ये स्वतंत्र झालेल्या देशापुढे अनेक आव्हाने होती. इतर अनेक क्षेत्रांना निधी वाटपासाठी प्राथमिकता देणे आवश्यक होते. शासनापुढे देशातील लोकांचे अनेक ज्वलंत प्रश्न असतांना  अवकाशाच्या संशोधनावर करायचा खर्च अनाठायी समजला जाणे शक्य होते. त्याला मंजूरी मिळणे अवघड होते. पण देशाच्या विकासासाठी अंतराळ संशोधनाचा उपयोग होऊ शकतो हे सरकारला पटवून देण्यात शास्त्रज्ञांना यश आले आणि १९६२ मध्ये डॉ.भाभा यांच्या अणुशक्ती विभागाखालीच भारतीय राष्ट्रीय अंतरिक्ष अनुसंधान समिति (Indian National Committee for Space Research) (INCOSPAR) स्थापन करण्यात आली. या समितीचे नेतृत्व डॉ.विक्रम साराभाई यांनी केले. 

सुरुवातीला वातावरणामधील उच्च थरांचा अभ्यास करण्यासाठी लहान ‘साऊंडिंग’ रॉकेट उडवण्याचे प्रयोग करायचे ठरवले. त्यासाठी पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्तावर वसलेले केरळ मधले थुंबा हे लहानसे खेडे गाव निवडले. पण तिथे प्रयोगशाळेसाठी नवी इमारत बांधण्यासाठी बराच खर्च आला असता आणि वेळ लागला असता. तो वाचवण्यासाठी थुंबा इथल्या मेरी मॅग्डनेल या चारशे वर्षे जुन्या चर्च मध्ये “थुंबा इक्विटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन" (TERLS)चे पहिले ऑफिस थाटण्यात आले.  त्यासाठी तरुण शास्त्रज्ञ डॉ.अब्दुल कलाम यांच्यासह स्वतः डॉ.विक्रम साराभाई तिथल्या बिशपला जाऊन भेटले आणि त्यांनी रविवारच्या प्रार्थनासभेमध्ये जमलेल्या सर्व समुदायासमोर हा प्रस्ताव मांडून विज्ञानाचा उद्देशसुद्धा मानवतेचे उत्थान हाच आहे असे सांगून त्या चांगल्या कामासाठी चर्चचा उपयोग करण्यासाठी लोकांची अनुमति मागितली आणि त्यांना ती सहजपणे मिळाली. 

आकृति अवकाश संशोधन १ पहा :  समुद्रकिनाऱ्यावरील रॉकेट लाँच करायचे ठिकाण चर्च पासून किलोमीटरभर अंतरावर होते. रॉकेटचे सुटे भाग सायकलवरून आणून तिथल्या शाळेत किंवा समुद्रकिनाऱ्यावर रॉकेटची जुळवणी करावी लागली. अशा खडतर परिस्थितीवर मात करून २१ नोव्हेम्बर १९६३ रोजी भारताच्या भूमीवरून पहिले रॉकेट लाँच केले गेले आणि अंतराळ संशोधनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. हे पहिले रॉकेट अमेरिकेत बनवले गेले होते. त्यानंतर थुंबा इथूनच फ्रान्स आणि यूएसएसआरमधून आणलेली अनेक रॉकेट्स लाँच करण्यात आली. १९६५ मध्ये डॉ.साराभाईंनी अंतराळ कार्यक्रमाचे नियोजन आणि विस्तार करण्यासाठी   तिरुअनंतपुरम इथे अंतराळ संशोधन केंद्र स्थापन केले. त्यांच्या निधनानंतर या केंद्राला विक्रम साराभाई स्पेस सेंटर(VSSC) असे त्यांचेच नाव दिले गेले. १९६७ मध्ये भारतात तयार केलेले रोहिणी हे पहिले रॉकेट थुंबाहून उडवण्यात आले. १९६८ मध्ये भारताने थुंबाचे केंद्र संयुक्त राष्ट्रांना अर्पण केले. तिथे आता पाच लाँच पॅड्स असून जगभरातले अनेक देश तिथून आपली रॉकेट्स उडवतात.

१९६६मध्ये डॉ.होमी भाभा यांच्या अपघातात झालेल्या आकस्मिक निधनानंतर डॉ.विक्रम साराभाई यांची अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. अणुशक्ती आणि अवकाश या दोन्ही क्षेत्रांच्या संबंधातील सर्व संशोधन आणि प्रकल्प त्यांच्या अखत्यारीमध्ये होते. त्यांनी सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्स्पेरिमेंट (SITE साइट) या आंतरराष्ट्रीय प्रयोगासाठी नासाबरोबर वाटाघाटी सुरू करून १९६९ मध्ये त्यासाठी करार केला. 

अंतराळ संशोधन अधिक व्यापक करण्यासाठी अणुऊर्जा विभागामधील भारतीय अंतराळ संशोधन समिती(INCOSPAR)चे आधुनिकीकरण करून १५ ऑगस्ट १९६९ ला तिचे नामकरण ‘भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन’ (Indian Space Research Organization) म्हणजेच ‘इस्रो’ असे करण्यात आले. १९७१ मध्ये डॉ विक्रम साराभाई यांच्या आकस्मिक दुर्दैवी निधनाने भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाला मोठा धक्का बसला. पण त्यानंतर प्रो.सतीश धवन, प्रो.यू.आर राव, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि इतर शास्त्रज्ञांनी अवकाशसंशोधनाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली आणि प्रगतीची उच्च शिखरे गाठली. (आकृति अवकाश संशोधन २)

भारतात अनेक ठिकाणी अणुविद्युतगृहांचे प्रकल्प सुरू झाले होते आणि अणु ऊर्जा विभागाचा पसारा वाढत होता, तसेच अवकाश संशोधनातही नवनवी क्षेत्रे उदयाला येत होती याचा विचार करून १९७२ मध्ये भारत सरकारने अणु ऊर्जा विभागाचे विभाजन केले आणि एका वेगळ्या अंतरिक्ष आयोगाची (Space Commission) स्थापना केली. १ जून १९७२ पासून इस्रोला डिपार्टमेंट ऑफ स्पेस (DoS)च्या व्यवस्थापनाखाली आणले.  इस्रोने सुरुवातीपासूनच उपग्रह उडवण्यासाठी लागणारी रॉकेट्स आणि उपग्रहांचे विविध उपयोग यावर लक्ष केंद्रित करून त्याविषयीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान भारतात विकसित करायला सुरुवात केली होती. पण या बाबतीत पूर्णपणे आत्मनिर्भर होण्याची वाट न पाहता आधी त्या वेळी जगात जे तंत्रज्ञान उपलब्ध होते त्याचा होईल तितका उपयोग करून घ्यावा असे धोरण ठरवले.

डॉ.साराभाई यांनी सुरू केलेल्या साइट प्रकल्पासाठी १९७४मध्ये  नासाने ATS-6 हा उपग्रह तयार करून अवकाशातल्या जिओस्टेशनरी ऑर्बिंटमध्ये नेऊन ठेवला, आकाशवाणी व दूरचित्रवाणीने कृषिदर्शनसारखे खास कार्यक्रम तयार करून घेतले, या उपग्रहामधून येणारे संदेश ग्रहण करण्याची व्यवस्था देशभरामधील अनेक ठिकाणी  केली. अशी सगळी तयारी करून झाल्यावर नासा, इस्रो आणि आकाशवाणी यांच्या संयुक्त प्रयत्नामधून १९७५-७६मध्ये हा प्रकल्प राबवण्यात आला, देशभरातील सहा राज्यांमधल्या २४०० खेड्यांमधील दोन लाख प्रेक्षकांना दूरचित्रवाणी दाखवण्यात आली  आणि  प्राथमिक शाळांमधील पन्नास हजार शिक्षकांना विज्ञानाचे पाठ दिले. हा १९७५-७६ मधला जगातला सर्वात मोठा सामाजिक प्रयोग होता. अशा रीतीने देशाच्या विकासासाठी, विशेषतः ग्रामीण भागातील लोकांच्या शिक्षणासाठी उपग्रहांचा कसा उपयोग होऊ शकतो याचे प्रात्यक्षिक दाखवले गेले. 

या यशानंतर १९७७ ते १९७९ मध्ये सिंफनी या फ्रेंचजर्मन उपग्रहाचा उपयोग करून उपग्रह दूरसंचार प्रयोग Satellite Telecommunication Experiments Project (STEP) हा प्रकल्प राबवण्यात आला. भूस्थिर (जिओसिंक्रोनस) उपग्रह आणि जमीनीवरील केंद्रे यांच्या संयोगातून देशभरामधील परस्पर संपर्क कसा साधायचा यावर संशोधन करून देशभरात अशी केंद्रे स्थापन करण्यात आली. त्यांची रचना, निर्मिती व स्थापना करून ती चालवण्याचे सगळे तंत्रज्ञान आत्मसात करण्यात आले. या प्रयोगांमधून अशा प्रकारच्या उपग्रहांची आणि त्यांच्याबरोबर संपर्क ठेवण्याच्या तंत्रज्ञानाची समग्र माहिती भारताला मिळाली. 

अवकाशविज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा सर्वांगीण विकास करून त्याचा देशामधील जनतेच्या आणि मानवतेच्या कल्याणासाठी उपयोग करणे तसेच अवकाशातील ग्रहगोलांचे संशोधन करणे ही उद्दिष्टे समोर ठेवून इस्रो हे संगठन काम करत राहिले आहे. त्यात अग्निबाण (रॉकेट्स), उपग्रह आणि अंतराळयाने यांची रचना आणि उत्पादन करून त्यांना अवकाशात उडवणे, त्यांच्याशी संपर्क साधणारी जमीनीवरील केंद्रे उभारणे आणि त्यांचा उपयोग करून घेणे हे सगळे काम येते. 

अग्निबाण (रॉकेट्स)  (आकृति अवकाश संशोधन ३)

सुरुवातीची साउंड रॉकेट्स परदेशांमधून आणून थुंबा इथून उडवली जात होती. १९६५ नंतर तशा प्रकारची रॉकेट्स भारतातच तयार केली गेली. त्यांचे आकारमान आणि क्षमता यात वाढ होत गेली. त्यांचे प्रक्षेपण करण्यासाठी आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा इथे आणखी एक नवे लाँचिंग स्टेशन उभे केले गेले. १९७५ पासून साउंड रॉकेट्सचे काम रोहिणी साउंड रॉकेट (RSR) या प्रोग्रॅमखाली केले जात आहे. ही सर्व रॉकेट्स घनरूप इंधनावर उडतात. त्यात एक किंवा दोन स्टेजेस असतात. आतापर्यंत निरनिराळ्या प्रयोगांसाठी अशी हजारो रॉकेट्स तयार करून उडवली गेली आहेत. या भक्कम पायावर पुढील प्रगत रॉकेट्सचे तंत्रज्ञान विकसित केले गेले. 

भारतात तयार केलेल्या उपग्रहांना पृथ्वीच्या कक्षेत दाखल करण्यासाठी आवश्यक असलेले स्वतःचे प्रक्षेपक म्हणजेच रॉकेट सज्ज नसल्यामुळे आधी त्यासाठी इतर प्रगत देशांच्या मदतीवर विसंबून राहावे लागत होते. हे परावलंबन कमी करत स्वदेशी रॉकेट तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी इस्रोने सॅटेलाईत लॉन्च व्हेईकल प्रकल्प हातात घेतला. त्या प्रकल्पासाठी देशामध्येच एसएलव्ही -३ (Sattelite Launch Vehicle -3) या प्रकारची रॉकेट्स विकसित केली. या रॉकेटच्या प्रक्षेपणासाठी आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा इथे अधिक सुसज्ज आणि अत्याधुनिक उपग्रह प्रक्षेपण केंद्र उभारण्यात आले. १९७९ मध्ये पहिल्या रॉकेटची प्रायोगिक चाचणी घेतली गेली, त्यात आंशिक यश मिळाले. त्या अनुभवावरून काही सुधारणा करून तयार केलेले  एस.एल.व्ही -३  हे पहिले भारतीय रॉकेट १८ जुलै १९८० मध्ये डॉ कलामांच्या नेतृत्वाखाली अंतराळात झेपावले आणि त्याने रोहिणी हा उपग्रह अवकाशात नेऊन सोडला. हे काम यशस्वीरीत्या करणारा भारत हा जगातला सहावा देश ठरला. हे रॉकेट २२ मीटर उंच, १७ टन वजनाचे होते आणि ते ४० किलोग्रॅम वजनाच्या उपग्रहाला लो अर्थ ऑर्बिटमध्ये घेऊन जाण्यात सक्षम होते. त्यानंतर भारताने अनेक एसएलव्ही -३ रॉकेट्स उडवून निरनिराळ्या उपग्रहांना अंतराळात नेले. या रॉकेटमध्ये  घनरूप इंधनाची चार स्टेजेस असतात.

एसएलव्ही -३ मध्ये मिळवलेल्या यशानंतर घनरूप इंधनाच्या पाच स्टेजेस असलेली एएसएलव्ही (Augmented Satellite Launch Vehicle) रॉकेट्स तयार करण्यात आली. ती २४ मीटर उंच, ४०टन वजनाची होती आणि त्यांची क्षमता एसएलव्हीच्या तिपटीहून जास्त म्हणजे १५० किलोग्रॅम वजन पृथ्वीपासून ४०० किलोमीटर दूर लो अर्थ ऑर्बिटमध्ये घेऊन जाण्याएवढी होती. त्याचे पहिले प्रायोगिक उड्डाण १९८७मध्ये आणि दुसरे १९८८मध्ये केल्यावर १९९२ आणि १९९४मध्ये या रॉकेटचा उपयोग करून दोन उपग्रह यशस्वीरीत्या उडवण्यात आले. 

पीएसएलव्ही (Polar Satellite Launch Vehicle (PSLV) ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन ) हे तिसऱ्या पिढीमधले रॉकेट १९९४मध्ये पहिल्यांदा यशस्वीपणे उडवण्यात आले. यातले मुख्य रॉकेट ४४ मीटर उंच आणि २.८ मीटर व्यासाचे असून त्याचे वजन ३२०टन इतके असते. त्याच्या चार स्टेजेस असतात, त्यातल्या दोन घनरूप इंधनाच्या आणि दोन द्रवरूप इंधनाच्या असतात. शिवाय गरजेप्रमाणे त्यात थोडे बदल करून त्याला घनरूप इंधनाचे दोन किंवा चार किंवा सहा बूस्टर रॉकेट्स (Strap-on Motors) जोडता येतात. गेली तीस वर्षे ही रॉकेट्स इस्रोचे मुख्य प्रक्षेपक आहेत. यात थोडे बदल करून त्याच्याकडून निरनिराळी कामे करून घेता येतात. या रॉकेट्सबरोबर भारतासह इतर अनेक देशांचे उपग्रह अंतराळात सोडण्यात आले आहेत. एकाच उड्डाणात निरनिराळ्या कक्षांमध्ये उपग्रह नेऊन सोडण्याचे कामही हे रॉकेट करू शकते. एकदा तर या रॉकेटच्या सहाय्याने एकदम शंभर उपग्रह उडवण्यात आले होते. ते सगळे आपापल्या कक्षांमध्ये फिरत आहेत. चंद्रयान आणि मंगलयान यासारखी मोठी वैशिष्ट्यपूर्ण कामेसुद्धा पीएसएलव्हीकडूनच करून घेतली आहेत. अत्यंत विश्वसनीय, बहुगुणी (व्हर्सटाइल) आणि किफायतशीर असे प्रक्षेपक (लाँचर) म्हणून या रॉकेटने  जागतिक बाजारपेठेत प्रसिद्धी मिळवली आहे आणि उपग्रह उडवणारा एक प्रमुख देश म्हणून भारताची गणना होत आहे. 

पीएसएलव्ही नंतर इसरोने जीएसएलव्ही (Geosynchronous Satellite Launch Vehicle  भू-तुल्यकाली उपग्रह प्रमोचन रॉकेट ) हे त्याहून अधिक शक्तिशाली रॉकेट तयार केले. हे रॉकेट सुमारे ५२ मीटर उंच असून त्याचे वजन ४२० टन इतके असते आणि हे रॉकेट भूस्थिर कक्षेमध्ये २२२० किलोग्रॅम आणि लो अर्थ ऑर्बिटमध्ये ६००० किलोग्रॅम इतके वजन नेऊ शकते.  यात तीन स्टेजेस असून त्या अनुक्रमे घनरूप, द्रवरूप आणि क्रायोजेनिक इंधनांच्या असतात आणि त्याला चार द्रवरूप इंधनाची स्ट्रॅप ऑन रॉकेट्स जोडलेली असतात. रशीयाकडून आणलेल्या क्रायोजिनिक इंजिनाच्या सहाय्याने या रॉकेटचे पहिले उड्डाण २००१ साली झाले. त्यानंतर त्याने भारतातच तयार केलेल्या क्रायोजिनिक इंजिनासह २०१४मध्ये पहिले यशस्वी उड्डाण केले.

याहीपेक्षा अधिक शक्तिशाली असे LVM -3 हे नवे रॉकेट भूस्थिर कक्षेमध्ये ४००० किलोग्रॅम आणि लो अर्थ ऑर्बिटमध्ये १००००किलोग्रॅम इतके वजन असलेल्या उपग्रहांना प्रक्षेपित करू शकेल. गगनयान कार्यक्रमात मानवाला घेऊन जाण्यासाठी या रॉकेटचे  HLRV हे रूप तयार केले जात आहे. लहान उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यासाठी  SSLV हे एक नवे रॉकेट तयार केले जात आहे.

उपग्रह (आकृति अवकाश संशोधन -४)

स्वदेशी उपग्रह निर्मितीचे डॉ साराभाईंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉ.सतीश धवन यांनी प्रयत्न सुरू ठेवले. त्यांनी बंगळूर इथे इंडो सोव्हिएत सॅटेलाईट प्रोजेक्ट (ISSP) प्रकल्प  सुरू करून उपग्रह निर्मितीचा पाया घातला. डॉ.यु आर राव यांच्या नेतृत्वाखाली बंगळूर इथल्या पिनया भागात साध्या कामचलाऊ शेड मध्ये स्वदेशी उपग्रह निर्मितीचे काम सुरू झाले. शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नातून १९ एप्रिल १९७५ला आर्यभट्ट हा भारताने तयार केलेला पहिला स्वदेशी उपग्रह सोव्हिएत युनियनमधील कापुस्टीन यार ह्या अवकाश केंद्रावरून 'कॉसमॉस-3एम' रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आला. प्राचीन काळातील महान भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव या उपग्रहाला देण्यात आले. आर्यभट्ट उपग्रह मुख्यत्वे खगोलशास्त्र आणि क्ष-किरण भौतिकशास्त्र (X-ray astronomy) यांसारख्या क्षेत्रांमध्ये संशोधन करण्यासाठी बनवला गेला होता. या उपग्रहाचा व्यास सुमारे 1.4 मीटर होता. उपग्रहाच्या बाजूला सौर पॅनेल (solar panels) बसवण्यात आले होते, त्यामधून उपग्रहाला ऊर्जा मिळत होती. हा उपग्रह सुमारे 17 वर्षे अवकाशात होता, आणि 10 फेब्रुवारी 1992 रोजी तो पृथ्वीच्या वातावरणात परतला. आर्यभट्ट उपग्रह भारताच्या अवकाश कार्यक्रमातील एक महत्त्वाचे पाऊल ठरला. 

आर्यभट्टच्या यशानंतर दुसरे प्राचीन भारतीय गणितज्ञ आणि शास्त्रज्ञ भास्कराचार्य यांच्या नावाने दोन प्रायोगिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह (experimental remote sensing satellites) तयार करण्यात आले.  भास्कर-१ हा भारताचा पहिला प्रायोगिक रिमोट सेन्सिंग उपग्रह ७ जून १९७९ रोजी प्रक्षेपित केला. या उपग्रहामध्ये ऑनबोर्ड टीव्ही कॅमेरा आणि मायक्रोवेव्ह रेडिओमीटर (SAMIR) होते. त्याच्या योगे समुद्रशास्त्र आणि जलविज्ञानासाठी डेटा गोळा केला. भास्कर-२ हा उपग्रह २० नोव्हेंबर १९८१ रोजी प्रक्षेपित केला. भास्कर-१ प्रमाणेच, हा देखील एक प्रायोगिक रिमोट सेन्सिंग उपग्रह होता. या दोन उपग्रहांनी भारतीय अंतराळ कार्यक्रमात एक महत्त्वाचा टप्पा गाठला. त्यांच्या द्वारे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करण्यासाठी रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यास सुरुवात झाली. समुद्रशास्त्र (oceanography) आणि जलविज्ञान (hydrology) या क्षेत्रांमध्ये संशोधनासाठी उपयुक्त डेटा उपलब्ध झाला. या उपग्रहाने भारताच्या भूभागाच्या ३०० हून अधिक दूरचित्रफिती (television images) पाठवल्या. या उपग्रहाद्वारे मिळालेला डेटा 1991 पर्यंत गोळा करण्यात आला. हे उपग्रह परदेशांमधून उडवले गेले होते. पण या दरम्यान १९८० मध्ये रोहिणी हा उपग्रह भारतामधूनच प्रक्षेपित करण्यात आला.

मिळालेल्या अनुभवामधून भारतीय शास्त्रज्ञानी उपग्रहांच्या संदेशवहनाचे तंत्र आत्मसात केले आणि स्वदेशी उपग्रह कार्यक्रम, ‘इन्सॅट’ च्या निर्मितीला चालना मिळाली. उपग्रह प्रकल्पांच्या व्यवस्थापनासाठी इस्रो सॅटेलाईट सेंटर स्थापन झाले. १९८०च्या दशकात भारताने भारतीय राष्ट्रीय उपग्रह- इन्सॅट ही भूस्थिर उपग्रहांची मालिका विकसित केली. १० एप्रिल १९८२ रोजी इन्सॅट - १ ए या उपग्रहाचे प्रक्षेपण केले पण त्याने अपेक्षेइतके काम न केल्यामुळे त्याला सहा महिन्यांनंतर निवृत्त केले. त्यानंतर ३० ऑगस्ट १९८३ ला प्रक्षेपित केलेल्या इन्सॅट१ बी या उपग्रहाने १९९३पर्यंत चांगली सेवा दिली. इन्सॅट मालिकेत २४ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले गेले, त्यातले ११ आजही कार्यरत आहेत. या प्रणालीने भारताच्या दूरसंचार, आकाशवाणी , दूरदर्शन प्रसार , हवामानशास्त्र इत्यादी क्षेत्रात क्रांती आणली. इन्सॅट ही आशिया -पॅसिफिक क्षेत्रातील सर्वात मोठी देशांतर्गत दूरसंचार प्रणाली ठरली. इन्सॅटनंतर जीसॅट या मालिकेमध्ये वीस अधिक आधुनिक भूस्थिर (Geosynchronous Satellite) उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले.  भारताने आतापर्यंत सुमारे १६० उपग्रह तयार करून प्रक्षेपित केले आहेत, त्यातले फक्त ३७ युरोप व अमेरिकेमधून उडवले गेले आहेत, बाकीचे सगळे उपग्रह आपल्याच देशामधील प्रक्षेपण केंद्रावरून आपल्याच रॉकेट्सने उडवले आहेत.



आता भारतात सर्व प्रकारचे उपग्रह तयार केले जातात. (आकृति अवकाश संशोधन -५) संचार उपग्रहांमधून  इंटरनेट आणि टेलिफोन यासारख्या सेवा दिल्या जातात. भूप्रेक्षण उपग्रहांमधून जमीन आणि समुद्र यांचे निरीक्षण व सर्वेक्षण केले जाते, वैज्ञानिक आणि परीक्षणात्मक उपग्रह यांचेमधून विविध प्रयोग करून वातावरण व अवकाशाचे संशोधन केले जाते, नौवहन उपग्रहांमधून नेव्हिगेशनला मदत मिळते, लघु उपग्रहांचे विविध उपयोग असतात आणि महाविद्यालये व विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्याकडून विद्यार्थी उपग्रह तयार करवून घेऊन त्यांचे प्रक्षेपण केले जाते.

या लेखामधील बहुतेक माहिती आणि चित्रे इस्रोच्या वेबसाइटमधून घेतली आहेत. 




Thursday, October 09, 2025

अंतराळात मानवाची भरारी

प्राचीन काळात आकाश आणि अवकाश असा फरक नव्हता, किंबहुना आकाशाच्या पलीकडे असलेले अवकाश, अंतरिक्ष किंवा अंतराळ असे त्या शब्दांचे अर्थच नव्हते. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे वगैरे सगळे गोल आकाशातच भ्रमण करतात असे समजले जात होते. पुराणातल्या अनेक कथांमध्ये आकाशमार्गाचा उल्लेख आहे. पुराणातल्या विश्वामध्ये जमीनीवर मानवांची वस्ती होती, तर पाताळात दानवांचे आणि आकाशातल्या स्वर्गलोकामध्ये इंद्रदेवाचे राज्य होते. पण पृथ्वीवरील काही सम्राट आणि बरेचसे राक्षसांचे राजे थेट इंद्रावर स्वारी करून स्वर्गाचे राज्य जिंकून घेत असत. त्यांचे सगळे सैन्यच आकाशमार्गाने उडून वर जात असे. रावणाचा मुलगा मेघनाद याने इंद्राला जिंकून अनेक देवांना पकडून खाली आणले होते आणि त्यांना रावणाच्या घरात गडी म्हणून घरकामाला ठेवले होते. म्हणून त्याचे नाव इंद्रजित असे पडले होते. स्वतः रावणसुद्धा महादेवाच्या तपश्चर्येसाठी आकाशमार्गाने कैलासाकडे जात असे. वनातल्या सीतेचे हरण करण्यासाठी तो साधूचा वेष धरून आकाशमार्गे आला आणि तिला उचलून घेऊन आकाशामधूनच लंकेला परत गेला.  हनुमानाने जन्माला आल्याआल्याच  उगवत्या सूर्याच्या लालचुटुक बिंबाला गोड फळ समजून  ते खाण्यासाठी लगेच आकाशात उड्डाण केले होते. त्यानंतरही त्याने सीतेला शोधत लंकेला आणि द्रोणागिरी पर्वतावरील संजीवनी औषध आणण्यासाठी हिमालयाकडे उड्डाण केले होते. देव आणि दानवच नाही तर नारदमुनीसारखे काही ऋषीमुनीही अंतर्धान पावत आणि अदृष्यपणे क्षणार्धात दुसऱ्या ठिकाणी किंवा थेट दुसऱ्या लोकात जाऊन पोचत असत. 

घरात आईने आणि देवळात कीर्तनकारांनी रंगवून सांगितलेल्या या अद्भुत कथा लहान वयात खऱ्याच वाटत असत.  माझे सारे लहानपण अशा सुरस कथा ऐकण्यातच गेले. आमच्या लहान गावाच्या आसपास कुठेही विमानतळ नव्हता. क्वचित कधी तरी एकादे विमान दूर आकाशातून जातांना दिसायचे. तेंव्हा मला आकाशातल्या त्या विमानांचेही फार कौतुक वाटत नव्हते आणि युरी गागारिनने अंतरिक्षात जाऊन परत येण्यात फार मोठा पराक्रम केला असेल असेही त्या काळात मला वाटले नव्हते. पण मोठेपणी या विषयाचा अभ्यास केल्यानंतर मला सत्यपरिस्थितीची कल्पना आली. हवेपेक्षा जड असलेले विमान कसे उडू शकते हे समजले, हवेच्या थरांना पार करून अवकाशात जाणाऱ्या अग्निबाणांची रचना समजली आणि अवकाशात उडवलेले उपग्रह पृथ्वीभोवती का फिरत राहतात हे कळले आणि ही सगळी कामे किती अवघड असतात हे ही समजले. 

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत  अतिदुर्गम अशा ठिकाणी जाण्याचे महाकठीण आव्हान स्वीकारणे हासुद्धा एक मानवी पराक्रम समजला जातो. हिमालयाची उत्तुंग शिखरे, प्रशांत महासागराचा तळ किंवा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव अशा दुर्गम आणि निर्जन ठिकाणी जाऊन कुणालाही तिथे काय मिळण्यासारखे असते? उलट त्या प्रयत्नात स्वतःचा प्राण गमावण्याचा धोका मात्र असतो. तरीही काही साहसी लोक आपल्या जिवावर उदार होऊन आणि तन मन धन अर्पण करून अशा मोहिमेचा ध्यास धरतात आणि अपार कष्ट सहन करून ते ध्येय गाठतात.

विमानाचा शोध लागला त्या काळात आकाशात उडून येणे हेच एक मोठे धाडसाचे काम वाटत होते, पण कालांतराने ते सुरक्षित आणि सर्वसामान्य झाले. तोपर्यंत मानवाने आकाशाच्या पलीकडे असलेल्या अंतराळात भरारी मारण्याचा विचार सुरू केला.  यू एस ए (अमेरिका) आणि यू एस एस आर (रशिया) यांच्यात होत असलेल्या चढाओढीत सुरुवातीला रशियाने आणि त्याच्या पाठोपाठ अमेरिकेने अवकाशात काही उपग्रह सोडले. हे उपग्रह आणि पृथ्वीवरील नियंत्रणकक्ष यांच्यात चांगला खात्रीलायक संपर्क स्थापन झाल्यानंतर मानवाला अंतराळात पाठवण्याचे प्रयत्न सुरू झाले. अंतराळात गेलेल्या यानाला पृथ्वीवर परत आणता येणे आवश्यक होते म्हणून आधी काही रिकामी यानेच अवकाशापर्यंत उडवून त्यांना परत आणण्याचे प्रयत्न होत राहिले. 

हे काम यशस्वीरीत्या करता येते याची खात्री पटल्यानंतर १२ एप्रिल १९६१ रोजी युरी गागारिन हा पहिला अंतराळवीर अवकाशात जाऊन सुखरूप परत आला आणि तो लगेच त्या काळातला एक महानायक झाला. त्याच्या पाठोपाठ ५मे १९६१ला अमेरिकेचा अॅलन शेपर्ड अंतराळात जाऊन आला.(आकृति अंतराळमानव - १ ) युरी गागारिन फक्त एक पृथ्वीप्रदक्षिणा करून परत आला होता, तर शेपर्ड एकही प्रदक्षिणा पूर्ण न करता फक्त अवकाशात पोचून परत आला होता. रशियाचा व्होस्टोक आणि अमेरिकेचा मर्क्युरी या प्रोग्रॅम्सच्या अंतर्गत दोन दोन उड्डाणे झाल्यानंतर  २० फेब्रूवारी १९६२ला अमेरिकेच्या जॉन ग्लेन याने मर्क्युरी प्रोग्रॅमखालीच फ्रेंडशिप ७ या यानात बसून उड्डाण केले. त्याने आपल्या यानाचे स्वतः नियंत्रण करून पृथ्वीभोवती भराभर तीन वेळा फेऱ्या मारल्या आणि तो काही तासात परत आला. १६ जून १९६३ला रशियाने व्होस्टोक प्रोग्रॅमखालीच व्हॅलेंटिना तेरेश्कोव्हा या महिलेला अंतराळात पाठवले आणि तीही अंतराळात जाऊन आलेली पहिली महिला म्हणून जगप्रसिद्ध झाली. १८ मार्च १९६५ला रशियाच्याच अॅलेक्सी लेओनोव्ह याने पहिल्यांदाच आपल्या यानाच्या बाहेर निघून विशाल अंतराळात काही मिनिटे 'स्पेसवॉक' करून म्हणजे तरंगून दाखवले. या अंतराळवीरांना अमेरिकेत अॅस्ट्रोनॉट तर रशियात कॉस्मोनॉट असे म्हंटले जाते. त्यांना  अवकाशात नेऊन आणणाऱ्या वाहनांना स्पेसक्राफ्ट किंवा स्पेस व्हेइकल (अंतराळयान) असे म्हंटले जाते. ही वाहने सुद्धा काही काळ पृथ्वीला प्रदक्षिणा घालत असली तरी त्यांना उपग्रह न म्हणता अंतराळयान असे म्हंटले जाते.

या दोन्ही देशांनी त्यानंतर एकापाठोपाठ एक अनेक मोहिमा काढल्या. सुरुवातीला त्यांचे अंतराळवीर अवकाशात जाऊन सुखरूपपणे परत येत होते या उपलब्धीचेच मोठे अपरूप आणि कौतुक होते. हळू हळू त्यांनी पृथ्वीचे आणि अवकाशाचे निरीक्षण व संशोधन करून इतर माहिती गोळा करायला सुरुवात केली, पण ते काम करणारे अनेक मानवरहित उपग्रह आधीपासून कार्यरत होतेच. माणसांनी अवकाशात जाऊन त्यापेक्षा वेगळे काहीतरी जास्त काम करायला हवे. अमेरिका आणि रशिया हे दोघेही चंद्राची जास्त माहिती मिळवण्याचा कसून प्रयत्न करत होते. रशियाने ल्यूना कार्यक्रमामध्ये काही मानवरहित याने चंद्रावर पाठवली, तर अमेरिकेने आधी मानवरहित वाहने पाठवून मोहिमेची चाचणी करून घेतली आणि १९६९मध्ये अपोलो११ कार्यक्रमाअंतर्गत नील आर्मस्ट्रांग, बझ एल्ड्रिन आणि मायकेल कोलिन्स या तीघांना चंद्रविजयाच्या मोहिमेवर पाठवले. (आकृति अंतराळमानव -२) त्यातील कोलिन्स हा कोलंबिया नावाच्या कमांड मॉड्यूलमध्ये बसून चंद्राभोवती फिरत राहिला आणि आर्मस्ट्रांग व एल्ड्रिन ही अंतराळवीरांची जोडी ईगल नावाच्या ल्यूनर मॉड्यूलमधून चंद्रावर जाऊन उतरली.  त्यांनी तिथे जाऊन अमेरिकेचा झेंडा रोवला, अनेक फोटो काढले आणि चंद्रावरील दगड माती गोळा केली. त्यानंतर ते ईगलमध्ये बसून चंद्रावरून उडून कोलंबिया यानामध्ये गेले आणि कोलिन्ससह सुखरूपपणे पृथ्वीवर परत आले. हा एक ऐतिहासिक असा खूप मोठा  विक्रम होता.

रशियाने मानवाला चंद्रावर पाठवायचा नाद न धरता अवकाशातच काही काळ मुक्काम करून रहायच्या प्रयत्नांवर जास्त लक्ष दिले आणि १९७१मध्ये साल्यूत १ नावाचे पहिले स्पेस स्टेशन अवकाशात पाठवले. अमेरिकेचे अपोलो मिशन १९७२पर्यंत चालत राहिले आणि त्यातून चोवीस अॅस्ट्रोनॉट्स अवकाशात जाऊन आले. त्यातले काही चंद्रावर उतरले, तिथे राहून त्यांनी गाडी चालवली, चंद्रावरच्या निरनिराळ्या भागांची आणखी माहिती मिळवली आणि तिथले दगडधोंडे गोळा करून पृथ्वीवर आणले. रशिया आणि अमेरिका यांच्यासह भारतादि अनेक देशांनी मंगळ, शुक्र, गुरु आदि इतर ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी दूरवर अनेक मानवरहित याने पाठवली, काही याने सूर्याजवळ तर काही सूर्यमालिकेच्याही बाहेर पाठवली गेली. ती मात्र कधीच पृथ्वीवर परत आली नाहीत. 

अवकाशात एक प्रयोगशाळा ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू ठेवले गेले होतेच. अमेरिकेने पुन्हा पुन्हा वापरता येतील अशी स्पेस शटल नावाची प्रचंड वाहने तयार केली. (आकृति अंतराळमानव ३) या वाहनांमधून कृत्रिम उपग्रह, उपकरणे, इतर सामान आणि अंतराळवीर यांना अवकाशात घेऊन जाणे, त्यांना तिथल्या स्पेस स्टेशनवर नेऊन ठेवणे किंवा तिकडून पृथ्वीवर परत आणणे शक्य झाले. यातला स्पेस शटल ऑर्बायटर किंवा स्पेसप्लेन हा विमानासारखा दिसतो. त्यालाही पृथ्वीवरून उडवतांना एका मोठ्या रॉकेटला जोडून उडवले जाते. अवकाशामधून परत येतांना त्याला ग्लायडरसारखे हवेवर तरंगत तरंगत जमीनीवर उतरवता येते. हे ऑर्बायटर नव्या रॉकेट्सच्या सहाय्याने पुन्हा पुन्हा अवकाशात उडवता येते. एंटरप्राइज, कोलंबिया, चॅलेंजर, डिस्कव्हरी, अॅटलांटिस आणि एंडेव्हर या नावांचे ऑर्बाइटर्स तयार करून वापरले गेले. कोलंबिया या स्पेस शटलने १९८१मध्ये पहिले य़शस्वी उड्डाण केले. १९८३मध्ये अमेरिकेने स्पेस शटल मधून यंत्रसामुग्री आणि उपकरणे अवकाशात नेऊन स्पेसलॅब प्रस्थापित केली, तसेच १९९० मध्ये  हबल टेलिस्कोप ही महाकाय दुर्बिण अवकाशात नेऊन ठेवली. सन २०११पर्यंत निरनिराळ्या स्पेस शटल्सनी १३५ उड्डाणे केली आणि त्यातून अनेक अंतराळवीरांनी अवकाशात ये जा केली.  

रशियाने  १९७१ मध्ये सोल्युत १, त्यानंतर सोल्यूतचे काही अवतार आणि १९८७ साली मीर नावाची स्पेस स्टेशने तयार केली आणि बुरान नावाचे शटलही तयार केले.  त्यांचे सोयूझ हे यान अंतराळवीर आणि उपकरणांना स्पेस स्टेशनवर घेऊन जाण्यासाठी वापरले जात असे. सन २०००मध्ये या दोन्ही देशांनी जपान, कॅनडा आणि युरोपमधील काही देशांशी सहयोग करून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन नावाची कायम स्वरूपाची प्रयोगशाळा स्थापन केली ती आजतागायत सुरू आहे. ही सगळी स्पेस स्टेशने लो अर्थ ऑर्बिटमध्ये पृथ्वीभोवती वेगाने फिरत राहणारे कृत्रिम उपग्रह आहेत. नेहमी काही अंतराळवीर पृथ्वीवरून  तिथे जाऊन काही दिवस किंवा महिने राहतात आणि परत येतात. त्यांच्या तिथून निघण्यापूर्वीच अंतराळवीरांची नवी तुकडी तिथे जाऊन पोचते. यातले बहुतेकजण कुठल्या ना कुठल्या विषयातले तज्ञ असे शास्त्रज्ञ असतात आणि अंतराळातल्या प्रयोगशाळांमध्ये राहून नवनवे प्रयोग करतात. जे पृथ्वीवर राहून करता येणार नाही अशा प्रकारचे हे संशोधन असते. त्यांनी कोणते प्रयोग करायचे हे ठरवून त्यासाठी आवश्यक अशी सामुग्री आणि उपकरणे त्यांच्याबरोबर स्पेस शटलमधून स्पेस स्टेशनावर पाठवली जातात.

अमेरिका आणि रशिया या देशांनी निरनिराळ्या कार्यक्रमांमधून इतर काही मित्र देशांच्या अंतराळवीरांनाही अवकाशात जाण्याची संधी दिली. १९८४ साली भारताचा राकेश शर्मा रशियाच्या सोयुझ मोहिमेतून अवकाशात फिरून आला. आतापर्यंत ४७ देशांचे सुमारे सातशे अंतराळवीर अवकाशात गेले आहेत, त्यातले काही दुर्दैवी अपवाद वगळता बाकीचे सगळे सुखरूप परत आले आहेत. अमेरिकेने सर्वात जास्त म्हणजे सुमारे साडेतीनशे अंतराळवीरांना अवकाशात पाठवले आहे, त्यात मूळ भारतीय वंशाच्या कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स या दोन महिला आहेत. रशिया आणि अमेरिकेनंतर २००३मध्ये चीन या तिसऱ्या देशाने स्वतःच्या यानामधून अंतराळवीरांना अवकाशात पाठवून परत आणले. २०२०पासून अमेरिकेतल्या स्पेसेक्स या खाजगी कंपनीने अनेक लोकांना अवकाशात पाठवून त्यांना स्पेस स्टेशनवर पोचवले. भारताच्या इसरोनेही मानवांना अंतराळात पाठवण्यासाठी गगनयान नावाची योजना आखली आहे आणि त्यासाठी काही अंतराळवीरांची निवड केली आहे. पुढील दोन तीन वर्षांमध्ये ही योजना कार्यान्वित होईल असा अंदाज आहे.

पृथ्वी आणि अंतराळ यात खूप फरक असतो. मुख्य म्हणजे अंतराळामध्ये वातावरण नसल्यामुळे तिथे आजूबाजूच्या हवेचा दाब किंवा तापमान नसते. अंतराळात सकाळ, संध्याकाळ आणि रात्र नसते, तिथे सतत तेजस्वी सूर्य तळपत असतो. एखादा उपग्रह पृथ्वीभोवती फिरत असतांना जेवढा वेळ तो पृथ्वीच्या सावलीत जातो तेवढा वेळ सोडला तर बाकीच्या वेळात त्याच्या सूर्याकडे असलेल्या भागावर प्रखर ऊन पडत असते. काही सूर्यकिरणांचे त्याच्यावरून परावर्तन होते तर काही किरण शोषले जातात. त्यांच्यामुळे त्या भागाचे तापमान वाढत जाते, पण उपग्रहाच्या सर्वच भागांमधून सतत अवकाशात ऊष्णतेचे उत्सर्जन चालले असल्यामुळे तो वेगाने अतीशय थंड होत असतो. यामुळे काही भागात काही वेळ खूप जास्त (शंभर अंशाहून जास्त) तापमान आणि इतर ठिकाणी शून्याच्याही खूप खाली(उणे अडीचशे अंशाच्याही खाली) तापमान अशी विषम परिस्थिती येत असते. उपग्रहाचे, यानाचे आणि स्पेससूटचे भाग बनवण्यासाठी जे धातू किंवा अधातू निवडले जातात त्यांचे गुणधर्म खूप जास्त किंवा खूप कमी तापमानातही स्थिर राहतील हे पाहिले जाते आणि त्यांचे प्रयोगशाळांमध्ये कसून परिक्षण केले जाते. काही उपकरणांना आणि नाजुक भागांना संरक्षक कवच लावले जाते, त्यांचे तापमान मर्यादेत राखण्यासाठी खास प्रकारची थर्मल कंट्रोल सिस्टम असते. उपग्रहामधील बहुतेक सगळी उपकरणे विजेवर चालणारी असतात. त्यांना विजेचा प्रवाह पुरवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या बॅटऱ्या ठेवलेल्या असतात आणि त्या बॅटऱ्यांना चार्ज करण्यासाठी मोठमोठी सोलर पॅनेल्स बसवलेली असतात. त्यामुळे उपग्रहांचे उपयुक्त आयुष्य वाढते, पण त्या उपकरणांमध्ये बिघाड झाला तर ती उपकरणे काम करत नाहीत. तरीही ते उपग्रह आपल्या कक्षांमध्ये फिरतच राहतात. त्यांना पृथ्वीवर परत आणले जात नाही.  मात्र अवकाशात काम करतांना त्या उपग्रहावर आणि त्यातल्या उपकरणांवर काय परिणाम होत असतो याचाच अभ्यास करण्यासाठी किंवा अशा प्रकारच्या संशोधनकार्यासाठी  काही उपग्रहांमध्येच त्यांना पृथ्वीवर परत आणण्याची व्यवस्था केली जाते, त्यांना वगळता इतर उपग्रहांना पृथ्वीवर परत आणण्याचे कुठलेही साधन नसते.

मानवाला अवकाशात पाठवल्यावर मात्र तो सुखरूपपणे परत येईल याची विश्वसनीय व्यवस्था केली जातेच. त्यासाठी इथून जातांनाच  परत येण्यासाठी लागणारी जास्तीची यंत्रसामुग्री त्यांच्या अंतराळयानांमध्ये ठेवावी लागते. उपग्रहांमधल्या निर्जीव यंत्रांना चालत राहण्यासाठी विजेखेरीज आणखी कशाची गरज नसते, पण माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्न, पाणी आणि हवा यांची अत्यंत आवश्यकता असते. त्याला या गोष्टी अंतराळात मिळणे शक्य नसल्यामुळे पृथ्वीवरून उड्डाण करतांनाच त्या बरोबर घेऊन जाव्या लागतात. जमीनीवर आपण रोज स्वयंपाक करून ताजे अन्न खाऊ शकतो, तसे करणे अंतराळात शक्य नसते. त्या अंतराळवीरांसाठी पौष्टिक, रुचकर, सहज पचण्यासारखे आणि टिकाऊ असे विशिष्ट प्रकारचे अन्नपदार्थ मुद्दाम तयार करवून घेऊन त्यांना सोबत नेण्यासाठी दिले जातात. पृथ्वीवर राहणारा प्रत्येक माणूस रोज २ ते ३ लिटर पाणी पितो आणि स्वैपाक, आंघोळ, हातपाय आणि तोंड धुणे, कपडे धुणे आणि भांडी घासणे वगैरेंवर  कित्येक लिटर पाणी खर्च करतो. अंतराळवीरांना इतके पाणी घेऊन जाणे शक्य नसल्यामुळे ते तिकडे गेल्यावर असली कामे करतच नाहीत.

स्पेस स्टेशनसारख्या ठिकाणी जिथे अंतराळवीर दीर्घ काळ मुक्काम करून राहतात तिथे पाण्याचा पुनर्वापर करण्याची चोख व्यवस्था केलेली असते. माणसाने प्यायलेले बहुतेक सगळे पाणी श्वासोच्छ्वास, घाम आणि मूत्र यातून शरीराबाहेर पडत असते, तसेच इतर कारणांसाठी पाण्याचा थोडा उपयोग करावा लागतो, यातला थेंबनथेंब गोळा करून आणि शुद्ध करून पुन्हा वापरासाठी उपलब्ध केला जातो. यासाठी तिथे विशेष प्रकारची यंत्रसामुग्री ठेवावी लागते. स्पेस सेंटरसारख्या ठिकाणी साधारणपणे पृथ्वीवर असलेल्या वातावरणासारखीच हवा पुरवलेली असते, पण श्वासोच्छवासामधून निघालेला कार्बन डायॉक्साइड वायू बाजूला काढून प्राणवायूचा पुरवठा करत राहण्याची योजना केलेली असते. जे अंतराळवीर फक्त वर जाऊन परत येतात किंवा स्पेसवॉक करतांना अवकाशात जातात त्यांच्या स्पेससूटमध्येच प्राणवायू आणि नायट्रोजन वायू यांचे विशिष्ट प्रमाणातले मिश्रण पुरवले जाण्याची व्यवस्था असते.

अंतराळवीरांची अन्नपाणी व हवा यांची गरज भागवणे एवढेच पुरेसे नसते. पृथ्वीवर आपल्या शरीराला इथल्या वातावरणाचा दाब आणि तापमान यांची सवय असते.  अंतराळातल्या निर्वात पोकळीत आणि अतिशीत तापमानात मानवी शरीर तग धरू शकणार नाही. शरीराला सोसेल इतकाच शरीराच्या बाहेर असलेल्या हवेचा दाब आणि तापमान राहील याची विशेष काळजी स्पेस स्टेशन आणि स्पेससूटमध्ये  घेतली जाते. रक्ताभिसरण आणि अन्नपचन यासकट आपल्या शरीराच्या सगळ्या व्यवहारांवर पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होत असतो . इथेही आपण नेहमी जमीनीवर उभे किंवा आडवे असतो, शीर्षासन करून फार वेळ राहू शकत नाही. अंतराळात जमीनच नसल्यामुळे काय उभे आणि काय आडवे? तिथे अंतराळवीर उभे, आडवे, तिरके, उफराटे अशा कुठल्याही पोजमध्ये तरंगत राहतात. तिथे तोल जाऊन खाली पडण्याची भीतीच नसते, पण त्यामुळे शरीराचा तोल सांभाळण्याच्या शरीराच्या नैसर्गिक क्रियेवर परिणाम होतो. अंतराळात असतांना शरीराचे वजन पायावर तोलले जात नसल्यामुळे पायांचे स्नायू कमजोर होत जातात. त्यांची शक्ती शाबूत ठेवण्यासाठी त्यांना विशेष व्यायाम करत रहावे लागते. तिथे गुरुत्वाकर्षणाच्या अभावी  रक्ताभिसरण आणि अन्नपचन वगैरेंमध्ये बाधा आल्यामुळे  उलट्या, डोकेदुखी, चक्कर येणे असे त्रासही होतात. सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकारी यांना पृथ्वीवर परत आणल्यानंतर यानामधून बाहेर काढतांना स्ट्रेचरवर घेतले होते हे आपण व्हीडिओमध्ये पाहिले होते. अंतराळवीरांना खाली आल्यानंतर काही दिवस विशेष ट्रीटमेंट देऊन आणि व्यायाम करवून घेऊन पुन्हा आपल्या पायांवर उभे केले जाते. 

स्पेससूट या विशिष्ट प्रकारच्या पोशाखावरून अंतराळवीर लगेच ओळखला जातो. घातक ठिकाणी काम करणाऱ्या काही कामगारांना खास प्रकारचा ओव्हरऑल ड्रेस घावावा लागतो तो बाहेरच्या हवेमधील दूषित पदार्थ शरीरात जाऊ नयेत यासाठी असतो, पण अंतराळवीरांच्या शरीरामधील हवा किंवा पाणी बाहेरच्या निर्वात पोकळीत उडून जाऊ नये यासाठी त्यांना हा खास स्पेससूट घालावा लागतो. अंतराळामधील निर्वात पोकळी, तिथले प्रखर सूर्यकिरण आणि त्यामुळे होणारे विषम तापमान, अल्ट्राव्हायोलेटसारखे घातक किरण, मधूनच वेगाने उडत असलेल्या सूक्ष्म आकाराच्या उल्कांचे कण या सर्वांपासून बचाव करणे, श्वसनासाठी प्राणवायू पुरवणे, हातापायांच्या हालचाली करता येणे आणि मायक्रोफोन व स्पीकरमधून संपर्क साधता येणे हे मुख्य उद्देश  लक्षात घेऊन या स्पेससूटची रचना केली जाते.  त्यांचेही अनेक प्रकार असतात. (आकृति अंतराळवीर -४) फक्त यानामधून अंतराळापर्यंत जाऊन परत येण्यासाठी सुटसुटित सूट असतो, तर स्पेसवॉक करणे, अंतराळयानाच्या बाहेर जाऊन काही काम करणे किंवा चंद्रावर उतरणे यासाठी खूप जाडजूड सूट असतात. त्यात अनेक पदर (लेयर्स) असतात. सर्वात आतला मऊ कपडा शरीराला घट्ट बसतो तर सर्वात बाहेरचा कणखर कपडा सगळे धक्के सहन करणारा अभेद्य असा असतो. अंतराळवीराच्या शरीराला बाहेरच्या बाजूने हवेचा दाब मिळावा म्हणून त्याच्या श्वसनासाठी लागणारा प्राणवायूही त्याच्या पोशाखातच भरून ठेवलेला असतो, त्यामुळे तो टम्म फुगलेला दिसतो. अंतराळवीर या स्पेससूटमध्ये नखशिखांत झाकलेला असतो. त्याला समोरचे पहाता यावे यासाठी विशिष्ट प्रकारची अभेद्य अशी काच त्या पोशाखाच्या हेलमेटमध्ये बसवलेली असते.  

अंतराळवीरांना आधी सुमारे दोन वर्षे प्रशिक्षण दिले जाते. अंतराळात गुरुत्वाकर्षणाच्या अभावी होणारे त्रास सहन करता यावेत यासाठी अंतराळवीरांच्या ट्रेनिंगमध्ये त्यांना निरनिराळ्या यंत्रांमध्ये उभे, आडवे, वाकडे, तिकडे कसेही ठेवून वेगाने गरागरा फिरवून किंवा खाली वर करून गुरुत्वाकर्षणहीन अवस्थेचा सराव केला जातो. माणसाला एका संकुचित जागेत एकट्याने खूप वेळ राहणेही अवघड असते. यासाठी त्यांना स्पेससूटमध्ये तास न तास बसणे, उठणे, चालणे वगैरे क्रिया करून त्याची सवय करून घेतली जाते. त्यांना त्यांच्या यानाची समग्र माहिती दिली जाते. त्या यानाच्या प्रतिकृतीमध्ये बसवून तिथली सगळी उपकरणे कशी वापरायची याची सिम्युलेटरवरून प्रॅक्टिस करून घेतली जाते. या प्रवासात कोणत्या अनपेक्षित गोष्टी किंवा अपघात घडू शकतात हे सिम्युलेटरवर दाखवून  त्या वेळी काय करायचे हे प्रात्यक्षिकांसह शिकवले जाते. त्यासाठी आवश्यक तेवढे विज्ञान आणि तंत्रज्ञान यातले विषयही थिअरॉटिकल शिक्षणात शिकवले जातात. त्यांच्याकडून रोजच सैनिकांसारखे भरपूर व्यायाम करून घेतले जातात. प्रत्येक उमेदवाराची शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक क्षमता यांची कसून  तपासणी केली जात असते. जे उमेदवार या सगळ्या दिव्यांमधून तावून सुलाखून निघतील त्यांचीच प्रत्यक्ष उड्डाणासाठी निवड केली जाते. 

अवकाशातून परत येणारे यान नेमक्या जागी आणून उतरवता येईल अशी व्यवस्था स्पेस शटलसाठी केलेली असते. पण इतर सगळ्या यानांना तसे करता येत नाही. अवकाशात गेलेले अंतराळयान उपग्रहासारखे सतत पृथ्वीभोवती वेगाने फिरत असते. त्यावर अनेक छोटी छोटी रॉकेट इंजिने असतात. ती इंजिने सुरू केल्यावर त्यातून निघालेल्या वायूंच्या झोतांच्या प्रतिक्रियेने यानाचा वेग कमी केला जातो आणि ते पृथ्वीभोवती फिरत फिरतच वेगाने खाली येत राहते. ते पृथ्वीपासून काही अंतरावर येताच अवाढव्य आकाराची पॅराशूट्स उघडतात आणि हवेतून तरंगत समुद्रात कुठेतरी त्या यानाला उतरवतात. ते यान अंदाजे कुठे उतरेल हे त्याची गणिते करून ठरवलेले असते आणि अवकाशातून खाली यायला निघाल्यापासून त्याचे सतत बारकाईने निरीक्षणही चाललेले असते. त्या संभाव्य जागेच्या आसपास विशेष प्रकारची जहाजे समुद्रात फिरत ठेवलेली असतात. त्या जहाजांमधले लोक अंतराळवीरांच्या कॅपसूल्सना  मुख्य जहाजाकडे ओढून नेतात आणि तिथे त्या कॅपसूलचा दरवाजा उघडून प्रवाशांना जहाजावर घेऊन जातात. सुनीता विलियम्स आणि बॅरी विलमोर हे अंतराळवीर काही तांत्रिक कारणांमुळे स्पेस स्टेशनवर अडकून पडले होते. त्यांच्यासह चार अंतराळवीरांना स्पेसेक्सच्या ड्रॅगॉन कॅपसूलमधून पृथ्वीवर  आणले गेले.(आकृति अंतराळमानव -५) या सगळ्या प्रक्रियेचे उदाहरण टेलिव्हिजनवर सगळ्या जगाने पाहिले होते.  

एव्हरेस्ट शिखर किंवा दक्षिण ध्रुवावर जाण्याची अनावर ऊर्मी एखाद्या साहसी व्यक्तीच्या मनात निर्माण होते तेंव्हा ती व्यक्तीच त्यासाठी कोणकोणती साधने लागतील आणि किती खर्च येईल याची चौकशी करून सगळी जमवाजमवी करते आणि ते कार्य साध्य झाल्यावर त्याचे सगळे श्रेय तिलाच दिले जाते. अवकाशात जाणाऱ्यांची गोष्ट वेगळी असे. नासा, इस्रो किंवा तत्सम संस्था स्पेस प्रोग्रॅम आणि त्यासाठी लागणारे यान आणि रॉकेट्स  ठरवून ती तयार करून घेतात. त्या मोहिमेवर पाठवण्यासाठी अनेक उमेदवारांच्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक अवस्थांच्या परिक्षा घेऊन त्यातून निवड करतात. त्यांना प्रशिक्षण देऊन तयार केलेल्या लोकांमधून अखेर अंतराळवीरांची निवड करून त्यांना अंतराळात पाठवले जाते. युरी गागारिन किंवा नील आर्मस्ट्राँग अशांच्या नावाला प्रसिद्धी मिळाली असली तरी त्यांना पाठवणाऱ्या यंत्रणांमध्ये काम करणारे अनामिक तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ हेच त्यांच्या यशाचे खरे धनी असतात. 

आपणही एकदा अवकाशात जाऊन यावे अशी कुणाच्याही मनात कितीही तीव्र इच्छा असली तरी ती पूर्ण करता येण्याची कसलीही सोय पूर्वी नव्हती, पण या शतकात काही कंपन्यांनी अंतरिक्षाचे पर्यटन सुरू केले. (आकृति अंतराळमानव -६) अमेरिकन इंजिनियर आणि बिझिनेसमॅन डेनिस टिटो हा पहिला प्रवासी २००१ मध्ये सोयूझच्या यानातून अवकाशात जाऊन आला, तर अनौशेह अन्सारी नावाची इराणी अमेरिकन ही पहिली महिला प्रवासीसुद्धा सोयूझमधूनच २००६ मध्ये अवकाशात जाऊन आली. तिच्या आधी टिटोसह तीन पुरुष प्रवासी अवकाशात फिरून आले होते. या सगळ्या लोकांनी काही कोटी डॉलर्स खर्च करून ही यात्रा केली होती. नंतरच्या काळात अधिक कंपन्या या क्षेत्रात उतरल्या. स्पेसेक्सने तर स्वतःची याने आणि रॉकेट्स तयार करून हौशी प्रवाशांची वाहतूक सुरू केलीच, ते नासाच्या अंतराळवीरांची ने आण ही त्यांच्या यानातून करायला लागले. स्पेस स्टेशनवर अडकून पडलेले सुनीता विलियम्स आणि बॅरी विलमोर हे अंतराळवीर स्पेसेक्सच्या यानामधूनच परत आले. स्पेस स्टेशनपर्यंत जाऊन तिथून परत येण्यासाठी अजूनही कोट्यवधि डॉलर्स लागतातच, पण काही कंपन्यांनी फक्त पंधरा मिनिटात कार्मान लाइनच्या पलीकडे अवकाशात जाऊन परत येण्याच्या लहान सहली काढल्या आहेत, त्या काही लाख डॉलर्समध्ये करता येतील. त्यातून जाणाऱ्या यात्रेकरूंना कदाचित काळेभोर अवकाश, त्यात  एका बाजूला विलक्षण तेजस्वी सूर्य, तर इतर भागात असंख्य चांदण्याही चमकतांना दिसतील, तसेच सुंदर निळी वसुंधरा दुरून पहायला मिळेल. या सगळ्यांची तब्येत धडधाकट असणे आवश्यक असतेच, त्यांनाही आधी विशेष प्रकारचे थोडे ट्रेनिंगही घ्यावे लागतेच. अंतराळयान आणि अग्निबाण यांच्यावरील खर्च अवाढव्य असल्यामुळे अवकाशात जाणे हे अजूनही सामान्य माणसाच्या आटोक्यात नाहीच आणि नजीकच्या भविष्यात तशी शक्यता दिसत नाही.


या वर्षी २५ जून २०२५ रोजी अॅक्सियम मिशन ४ या मोहिमेतून भारताचा दुसरा अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला याने स्पेसेक्सच्या फाल्कन ९ या रॉकेटच्या सहाय्याने उडवलेल्या क्र्यू ड्रॅगन ग्रेस स्पेसक्राफ्ट या अंतराळयानामधून उड्डाण केले आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांसह तो इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जाऊन पोचला. तो भारताच्या इस्रोतर्फे अॅक्झियम ४ या आंतरराष्ट्रीय मोहिमेत सहभागी झाला होता आणि  त्याने दोन आठवडे आय एस एस मध्ये राहून अनेक प्रयोग केले. त्यानंतर हे अंतराळवीर त्याच यानात बसून पृथ्वीकडे परत आले आणि दि.१५ जुलै रोजी  अमेरिकेच्या सॅन डिअॅगोजवळ प्रशांत महासागरात उतरले. हे अभियान अॅक्सियम, नासा आणि स्पेसेक्स  या संस्थांनी संयुक्तपणे केले होते. यात अमेरिकेची पेगी व्हिटसन ही दीर्घ अनुभव असलेली अॅस्ट्रोनॉट या मिशनची कमांडर होती,  भारताच्या इस्रोचा शुभांशु शुक्ला हा पायलट होता आणि पोलंड व हंगेरी या देशातले सहप्रवासी अंतराळवीर होते. यापूर्वी भारत, पोलंड आणि हंगेरी या देशांचे एक एक अंतराळवीर पन्नास वर्षांपूर्वी रशियाच्या सोयुझ यानांमधून अंतराळात जाऊन आले होते, त्यानंतर अंतराळात जाणारे हे त्या देशांमधील दुसऱ्या क्रमांकाचे अंतराळवीर होते. शुभांशु शुक्ला याचे उड्डाण हे इस्रोसाठी त्यांच्या गगनयान प्रकल्पाचा  महत्वाचा भाग होता आणि त्याच्या अनुभवाचा उपयोग त्या मोहिमेतील अंतराळवीरांच्या प्रशिक्षणात तसेच त्या मोहिमेच्या आखणीत होणार आहे.  आणखी पाचदहा वर्षात भारताचे अनेक अंतराळवीर अवकाशात गेलेले दिसतील.




--------------------


Sunday, August 10, 2025

नवग्रह ते उपग्रह

 

 सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि आणि राहू, केतू या सर्वांना 'ग्रह' मानून या नऊ ग्रहांना मिळून नवग्रहांची पूजा केली जाते. या नवग्रहांचे एक स्तोत्र आहे, त्यात प्रत्येक ग्रहाची स्तुति करून त्यांना नमस्कार केला आहे. या स्तोत्रात असे लिहिले आहे की सर्व पापांचा नाश करणारा महातेजस्वी सूर्य हा कश्यप ऋषींचा पुत्र आहे, शंकराच्या मुकुटाचे भूषण असणारा चंद्र क्षीरसागराच्या मंथनातून जन्माला आला, विजेसारखी कांति धारण करणारा मंगळ हा ग्रह पृथ्वीच्या गर्भातून जन्माला आला आहे, अत्यंत रूपवान असा बुध हा चंद्राचा मुलगा आहे, सर्वज्ञ गुरु किंवा बृहस्पती हे सर्व देवांचे गुरु आहेत, दैत्यांचे गुरु असलेले शुक्र भृगु ऋषीचे पुत्र आहेत, काळपट निळ्या रंगाचा शनि हा सूर्य आणि छाया यांचा पुत्र आहे, चंद्र आणि सूर्य यांच्याशी लढणारा राहू हा सिंहिकेचा पुत्र आहे आणि सगळ्या तारका आणि ग्रह यांचा मुकुटमणी असलेला केतू महापराक्रमी आहे. या सगळ्या पुराणातल्या कथा हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या आहेत आणि फारच कमी लोकांना त्या माहीत असतात. या कथांमध्ये या सगळ्या ग्रहांना माणसांसारखे शरीर आणि राग, द्वेष, प्रेम, मत्सर वगैरे गुणही दिले आहेत. म्हणून त्यांची स्तुति केली तर ते प्रसन्न होतात किंवा क्षमा करतात आणि कधी कधी ते रुष्ट होतात आणि शिक्षा करतात अशा कहाण्या आहेत. आकाशातले हे सगळे ग्रह पृथ्वीवरच्या घटना घडवून आणतात, इतकेच नव्हे तर प्रत्येक माणसाचे व्यक्तिमत्व, त्याचा स्वभाव, त्याचे नशीब वगैरे ठरवतात आणि त्याचा उत्कर्ष किंवा ऱ्हास घडवून आणतात असे ज्योतिष वर्तवण्यामधून सांगितले जाते आणि अनेक लोकांची त्यावर दृढ श्रद्धा असते. अनेक मोठ्या पूजाविधींचा भाग म्हणून आधी नवग्रहांची पूजा आणि शांत केली जाते.


यातल्या पहिल्या सात ग्रहांची नावे आठवड्यातल्या सात वारांना दिली आहेत. लोकांनी त्यातल्या प्रत्येक वारी एकेका ग्रहाचे आवर्जून दर्शन घ्यावे आणि त्याचा श्लोक म्हणून प्रार्थना करावी असा उद्देश त्याच्यामागे कदाचित असेलही. राहू आणि केतू हे अदृष्य किंबहुना काल्पनिक ग्रह असल्यामुळे त्यांचे दर्शन घेणे मात्र शक्यच नसते आणि त्यांच्या नावाचे वारही नाहीत. पुढील काळात देव म्हणून हे नवग्रह मागे पडले आणि त्यांच्या वारांवर वेगळ्या देवांची उपासना सुरू झाली. मग सोमवार शंकराचा, मंगळवार गणपतीचा, गुरुवार दत्ताचा, शुक्रवार अंबाबाईचा आणि शनिवार मारुतीचा झाला आणि त्या दिवशी या देवांच्या देवळात जाणे, त्यांची पूजा, आरती करणे वगैरे रूढ होत गेले.  सूर्य आणि चंद्र सोडला तर इतर ग्रह आकाशात केंव्हा आणि कुठे दिसतात हेच बहुसंख्य लोकांना माहीत नसते, त्यांना पहायची उत्सुकताही नसते आणि या ग्रहांना पहायचा प्रयत्नही ते करत नाहीत. त्यांच्या दृष्टीने हे फक्त एकदुसऱ्यांवर नजर ठेवून त्यांच्या कुंडलीतल्या घरांमधून भ्रमण करत असतात आणि त्याची फळे या लोकांना देत असतात.

जगभरातल्या निरनिराळ्या संस्कृतींमधील लोकांना दिवसभर आकाशात तळपणारा सूर्य, रात्रीच्या अंधारात थोडा उजेड देणारा चंद्र आणि रात्री आकाशात चमकणारे ग्रह व तारे यांच्याबद्दल प्राचीन काळापासून गूढ आणि भीतीयुक्त असा आदर वाटत आला आहे. जसे त्यांना भारतात देवता मानले गेले त्याचप्रमाणे ग्रीक आणि रोमन मायथॉलॉजीमध्येसुद्धा त्यांना मानाची स्थाने दिली आहेत.  हेलियस म्हणजे सूर्य हा सुद्धा रथामधून आकाशात फिरतो आणि पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट बारकाईने बघत असतो. त्यांच्या पुराणात चंद्राला सिलीन किंवा डायना असे सुस्वरूप स्त्रीरूप दिले आहे तसेच शुक्राला व्हीनस नावाची अत्यंत सुंदर देवता कल्पलेले आहे. गुरु म्हणजे ज्युपिटर हा सगळ्या देवांचा राजा आहे, तर मंगळ म्हणजे मार्स हा युद्धाचा देव आहे.  बुध हा देवांचा दूत तर शनि हा संपत्तीचा देव आहे. या सगळ्यांच्या निरनिराळ्या कुळकथा आणि आपसातली नातीगोतीही आहेत.

ख्रिश्चन धर्माच्या प्रसारानंतर त्या सर्वांचे देवपण नाहीसे झाले. त्यानंतर ग्रह आणि तारे हे परमेश्वराने तयार करून आकाशात फिरत ठेवलेले साधे गोल झाले. त्या धर्माच्या शिकवणीनुसार ईश्वराने हे सारे विश्व पृथ्वीवरील मनुष्यप्राण्यासाठी निर्माण केले असल्यामुळे सर्व तारे आणि ग्रह पृथ्वीभोवतीच फिरतात याबद्दल कोणाच्या मनात शंका नव्हती. साध्या नजरेला तसेच दिसते, हे सगळे ग्रह आणि तारे पूर्वेला उगवतांना आणि सगळ्या आकाशाला ओलांडून पश्चिमेला जाऊन मावळतांना दिसतात. टॉलेमीसारख्या प्रकांडपंडितांनी शेकडो वर्षांपूर्वी तसे निरीक्षण लिहून ठेवले होते आणि शेकडो वर्षे तसे मानले जात होते. त्या ग्रहताऱ्यांचे हे आकाशातले फिरणे पृथ्वीवरून कसे दिसते याचा मात्र अनेक पाश्चिमात्य विद्वानांनी बारकाईने अभ्यास केला होता. त्यासाठी त्यांनी आकाशातील इतर तारकांचे पुंज तयार करून त्यांना नावे दिली होती आणि त्याच्या संदर्भात हे ग्रह कसे फिरतात याचे निरीक्षण करून त्यावर ग्रंथ लिहिले होते. 

 आपल्या प्राचीन काळातील अनेक ऋषीमुनींनीही वर्षानुवर्षे खर्ची घालून आकाशातल्या अगणित तारकांचे खूप बारकाईने निरीक्षण केले आणि त्यांचा सूक्ष्म अभ्यास केला होता. त्यांनी मेष, वृषभ, मिथुन आदि बारा राशी आणि अश्विनि, भरणी यासारखी सत्तावीस नक्षत्रे यांची योजना करून संपूर्ण आकाशगोलाचा एक प्रकारचा नकाशा तयार केला होता आणि आर्यभट्ट व भास्कराचार्य यांच्यासारख्या विद्वानांनी त्यात मोलाची भर घातली होती. प्रत्येक राशी किंवा नक्षत्रामधली प्रत्येक चांदणी नेहमीच तिच्या स्थानावरच दिसते. पण मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनि हे पांच तेजोगोल मात्र आपापल्या गतीने स्वतंत्रपणे फिरतांना दिसतात हे पाहून त्यांना ग्रह हा वेगळा दर्जा देऊन देवपण दिले होते, तसेच त्यांनी त्यांच्या भ्रमणाच्या गती मोजल्या होत्या. आकाशातसुध्दा सगळेच काही दिसते तसेच नसते असे काही जुन्या विद्वान शास्त्रज्ञांनाही वाटले होतेच. “ज्याप्रमाणे अनुलोमगतीने जाणारा आणि नावेत बसलेला मनुष्य अचल असा किनारा विलोम जातांना पाहतो, त्याप्रमाणे लंकेमध्ये अचल असे तारे पश्चिम दिशेस जातांना दिसतात.” असे आर्यभटीयामधल्या एका श्लोकात लिहिले आहे. आणि  “प्रवह वायूकडून सतत ढकलला जाणारा सग्रह (ग्रहांसहित असा) भपंजर (तार्‍यांचे जाळे अथवा पिंजरा) (पूर्वेकडून) पश्चिमेकडे वाहून नेला जातो (किंवा तसा भास होतो).” असेही आर्यभटाने पुढच्या श्लोकात लिहिले आहे. पण त्यानंतरच्या काळात भारतीयांचा खगोलशास्त्राचा अभ्यास बहुधा खंडित झाला.

सोळाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात पोलंड या देशात निकोलाय कोपरनिकस नावाचा एक विद्वान माणूस चर्चमध्ये सेवा करत होता. तो अत्यंत बुध्दीमान, अभ्यासू आणि चिकित्सक वृत्तीचा होता. त्याने इतर काही शास्त्रांबरोबर खगोलशास्त्राचाही छंद जोपासला होता आणि उपलब्ध ग्रंथांचा अभ्यास केला होता. पण प्रत्यक्ष केलेल्या निरीक्षणामधून त्याच्या चाणाक्ष नजरेला काही वेगळे दिसल्यामुळे त्यातल्या कांही गोष्टींबद्दल त्याच्या मनात शंका निर्माण झाल्या.  आपण स्वतःभोवती गिरकी घेतो तेंव्हा आपल्या आजूबाजूच्या स्थिर असलेल्या वस्तू आपल्याभोवती फिरत आहेत असे आपल्याला वाटते. त्याचप्रमाणे कदाचित हे तारे आपापल्या जागेवरच स्थिर रहात असतील आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरत असली तर पृथ्वीवरून पहातांना आपल्याला मात्र ते तारे आकाशातून फिरतांना दिसत असतील असे होणे शक्य होते. अशाच प्रकारे स्वतःभोवती फिरत असतांना पृथ्वीचा जो अर्धा भाग सूर्याच्या समोर येत असेल तिथे दिवसाचा उजेड पडेल आणि उरलेला अर्धा भाग अंधारात असल्यामुळे तिथे रात्र असेल. असा विचार त्याने केला. त्यानंतर कोपरनिकसने सूर्य आणि ग्रह यांच्या आकाशातील भ्रमणासंबंधी वेगळा विचार केला. त्यांचे भ्रमण पृथ्वीवरून कसे दिसते याची माहिती एकमेकांशी जुळवून पाहिली, बरीच किचकट आंकडेमोड केली. बरेच प्रयत्न केल्यानंतर त्याला असे दिसले की जर पृथ्वी सूर्याभोंवती फिरत असली तर त्या ग्रहांच्या भ्रमणात बरीचशी सुसंगति आणता येते. त्याने हे गणितामधून सिध्द केले. पण तो हयात असेपर्यंत ही कल्पना सर्वमान्य होऊ शकली नव्हती. त्याच्या शंभर दोनशे वर्षांनंतर आलेल्या शास्त्रज्ञांनी कोपरनिकसच्या सांगण्याला खंबीरपणे उचलून धरले आणि सूर्यमालिकेचे बरोबर वर्णन केले.


मराठी काव्यांमध्ये शुक्रतारा किंवा शुक्राची चांदणी असे उल्लेख येतात. सर्वसामान्य माणसाला रात्रीच्या काळोखात आकाशात चमचमतांना दिसतात त्या सगळ्या चांदण्याच असतात, त्यातले ग्रह किंवा तारे एकमेकांसारखेच वाटतात. पण आकाशातल्या या सगळ्या गोलांचा शास्त्रीय अभ्यास केल्यानंतर पाश्चात्य शास्त्रज्ञांनी त्यांची स्टार्स, प्लॅनेट्स आणि सॅटेलाइट्स अशी वर्गवारी केली. या शब्दांचे मराठी भाषांतर करतांना त्यांना अनुक्रमे तारा, ग्रह आणि उपग्रह असी नावे दिली गेली. सूर्य हा एक तारा आहे. सगळे तारे स्वयंप्रकाशी आणि अजस्त्र आकाराचे असतात, त्यांच्या मानाने लहान आकारांचे असलेले गुरु, शुक्र, पृथ्वी यांच्यासारखे  ग्रह सूर्यासारख्या ताऱ्यांभोवती फिरत असतात आणि ग्रहांपेक्षाही लहान असे चंद्रासारखे उपग्रह या ग्रहांची प्रदक्षिणा करत असतात. 'तारा' आणि 'ग्रह' या आधीपासून मराठी भाषेत असलेल्या शब्दांना विज्ञानामध्ये विशिष्ट अर्थ दिले गेले आणि 'उपग्रह' हा एक नवा शब्द तयार केला गेला. विज्ञानाच्या भाषेत पहायला जाता नवग्रहांपैकी सूर्य हा एक तारा आहे, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि हे पाच ग्रह, चंद्र हा एक उपग्रह आणि राहू, केतू हे दोन काल्पनिक बिंदू असतात. गुरु आणि शनि यांच्यासारख्या मोठ्या ग्रहांभोवती फिरणारे त्यांचे अनेक उपग्रह आहेत पण पृथ्वीभोवती फिरत राहणारा चंद्र हा एकच नैसर्गिक उपग्रह आहे. 

 खाली जमीन आणि वर आकाश असेच सर्वसाधारणपणे समजले जाते. पक्षी आकाशात उडतात, ढग आकाशातून जातात आणि सूर्य, चंद्र व चांदण्याही आकाशातच दिसतात. पण विज्ञानाच्या भाषेत पृथ्वीच्या सभोवती असलेल्या वातावरणाच्या अंतिम थरापर्यंत आकाश पसरलेले आहे आणि त्याच्या पलीकडे असलेल्या अथांग निर्वात पोकळीला अवकाश, अंतराळ किंवा अंतरिक्ष म्हणावे असे सुमारे शंभर वर्षांपूर्वी ठरवले गेले. या दोघींमध्ये कोणतीही सीमारेषा नाही, ते एकमेकांशी सलगच आहेत. सर्व ग्रह आणि तारे पृथ्वीपासून खूप दूर अवकाशात असतात, पण मधली हवा आणि निर्वात पोकळी पारदर्शक असल्यामुळे आपल्याला ते आकाशातच दिसतात. विमाने आकाशात उडताना इंजिनांच्या शक्तीमुळे आणि पंखांच्या आधारे हवेवर तरंगत पुढे जात असतात त्यामुळे ती आकाशाच्या पलीकडे अवकाशाच्या हवारहित पोकळीत जाऊन उडू शकत नाहीत.

दुसऱ्या जागतिक महायुध्दानंतर विज्ञान व तंत्रज्ञानात, विशेषतः इलेक्ट्रॉनिक्समध्ये विलक्षण वेगाने प्रगती झाली आणि रॉकेट्सची निर्मिती आणि त्यांचे नियंत्रण या क्षेत्रात कल्पनातीत घोडदौड झाली. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून रॉकेटला अवकाशात सोडणे आणि त्याच्या सोबत पाठवलेल्या उपकरणांनी अवकाशातून पाठवलेले संदेश पृथ्वीवर ग्रहण करणे शक्य झाल्यानंतर अंतरिक्षातून पृथ्वीकडे  पाहण्याची एक नवी दृष्टी मानवाला प्राप्त झाली आणि या दिव्यदृष्टीचा उपयोग करून घेऊन विश्वाची जास्त माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. एकादी वस्तू अतीशय जास्त म्हणजे एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा जास्त वेगाने अवकाशात दूरवर भिरकावून दिली तर ती पृथ्वीवर खाली न येता आपोआपच तिच्याभोवती फिरत राहील हे गणिताने सिद्ध केले गेले होते. आधुनिक काळातील शक्तिशाली रॉकेटसोबत काही वस्तूंना अवकाशात धाडून देणे शक्य झाले. अशा वस्तूंना कृत्रिम उपग्रह म्हंटले जाते.

दुसऱ्या महायुध्दानंतरच्या काळात यू एस ए (अमेरिका) आणि यूएसएसआर (रशिया) या महासत्तांमध्ये जागतिक वर्चस्वासाठी चुरस लागली होती. १९५८मध्ये अमेरिका एक कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठवणार असल्याची चर्चा चालू असताना त्याच्या आधीच १९५७ साली रशियाने स्पुटनिक-१ हा पहिला मनुष्यनिर्मित उपग्रह अवकाशात सोडला. त्याच्या पाठोपाठ स्पुटनिक -२ या उपग्रहासोबत लायका नामक कुत्रीला अंतरिक्षात पाठवून दिले. अमेरिकेनेही थोड्याच दिवसांनी म्हणजे १९५८ साली एक्स्प्लोअरर -१ आणि व्हँगार्ड-१ हे उपग्रह एका पाठोपाठ सोडले. रशियाचा स्पुटनिक आणि अमेरिकेचा एक्स्प्लोअरर हे दोन्ही पहिले उपग्रह पृथ्वीभोवती सुमारे दोनतीनशे ते हजार दोन हजारपर्यंत किलोमीटर उंचीवरून लंबवर्तुळाकृति (एलिप्टिकल) कक्षेमध्ये फिरत होते. ते दर दीड दोन तासात एक म्हणजे रोज सुमारे बारा ते सोळा प्रदक्षिणा घालत होते. स्पुटनिक तसा साधा होता आणि जुजबी संदेश पाठवत होता, त्या मानाने एक्स्प्लोअररमध्ये संशोधनासाठी लागणारी बरीच उपकरणे ठेवली होती. हे दोन्ही उपग्रह काही काळ अंतराळात फिरत राहिल्यानंतर त्यांच्या बॅटरीज संपल्या आणि त्यांचे  संदेश पाठवणे थांबले. तरी ते उपग्रह पृथ्वीला प्रदक्षिणा घालत राहिले होते. काही काळानंतर त्यांची गति मंद होत गेली आणि  ते हळूहळू पृथ्वीच्या कक्षेत येऊन नष्ट झाले.

 त्यानंतर इतर देशांनीही आपापले उपग्रह सोडणे सुरू केले आणि त्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. आज  शंभरावर देशांनी पाठवलेले सुमारे बारा हजार कृत्रिम उपग्रह वेगवेगळ्या कक्षांमधून पृथ्वीची प्रदक्षिणा करीत आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात सरकारी प्रयोगशाळांनी केली होती आणि त्यांनी पाठवलेल्या उपग्रहांकडून मिळालेल्या माहितीचा उपयोग मुख्यतः संरक्षण, हवामान, भूसर्वेक्षण आदि सरकारी विभागच करत असत. दूरचित्रवाणी, दूरध्वनी, आंतर्जाल वगैरे माध्यमातून आम जनतेसाठी संदेशवहनाचा उपयोग होऊ लागल्यानंतर त्या कामासाठी अनेक निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातल्या संस्था पुढे आल्या किंवा निर्माण झाल्या. त्यांच्या गरजेनुसार विशिष्ट प्रकारांचे उपग्रह तयार करणे आणि त्यांना अंतराळात नेऊन सोडणे हे काम व्यावसायिक तत्वावर होऊ लागले. त्यांची संरचना, आरेखन, निर्माण, उड्डाण वगैरे करण्यात स्वयंपूर्ण असलेले देश आजही कमीच आहेत. त्यात भारताचा समावेश होतो ही अभिमानाची गोष्ट आहे. 

"रोजचाच चंद्र आज वाटतो नवा नवा " असे प्रेमिकांना वाटत असले आणि रोज आकाशात दिसणारा चंद्र खरोखरच अल्पशा फरकाने नवा दिसत असला तरी तो  प्रत्यक्षात एकासारखा फक्त एकच आहे. हे सर्व कृत्रिम उपग्रह मात्र एकमेकाहून खूप वेगळे असतात. त्यांच्या उद्दिष्टानुसार त्यांची निरनिराळ्या प्रकारांनी वर्गवारी करण्यात आली आहे. संदेशवहन किंवा संवाद (Communication),  दिशादर्शन  (Navigation), पृथ्वीचे निरीक्षण (Earth Observation), तंत्रज्ञान विकास (Technology Development) आणि अवकाश विज्ञान (Space Science)  असे काही मुख्य गट आहेत. 

हे उपग्रह म्हणजे अंतरिक्षातून पृथ्वीकडे  पाहण्याची दृष्टी असे समजले जाते. या कामासाठी अत्यंत कार्यक्षम असा उच्च दर्जाचा कॅमेरा सर्वात महत्वाचा असतो. या कॅमेराने काढलेली चित्रे पृथ्वीवर पाठवण्यासाठी त्यांचे विद्युल्लहरींमध्ये रूपांतर करून त्यांना पृथ्वीकडे पाठवण्याची यंत्रणा पाहिजे. तसेच पृथ्वीकडून आलेले संदेश स्वीकारून त्यांची अंमलबजावणी करणे, त्यांना उत्तर देणे वगैरे गोष्टी त्या उपग्रहांनी करायच्या असतात. बहुतेक उपग्रह मनुष्यविरहित असतात. त्यामुळे ही कामे करणारी सक्षम अशी स्वयंचलित यंत्रणा असावी लागते. मुख्य म्हणजे हे सगळे वजनाने हलके आणि कमीत कमी जागा व्यापणारे असायला हवे. मिनिएचरायझेशनमध्ये झालेल्या अपूर्व प्रगतीमुळेच हे शक्य झाले आहे. बहुतेक उपग्रहांमध्ये अशी उपकरणे आणि यंत्रे मांडून ठेवण्यासाठी पॅनेल्स आणि त्यांना धरून ठेवणारा एक सांगाडा एवढ्याच गोष्टी असतात. या उपकरणांना चालवण्यासाठी आता मुख्यतः सौर ऊर्जेचा उपयोग केला जातो. त्यासाठी उपग्रहांवर मोठमोठी सोलर पॅनेल्स लावलेली असतात. विमानांना हवेमधून सुलभपणे उडण्यासाठी त्यांना पक्ष्यांसारखा प्रमाणबद्ध आणि एरोफॉइल्सने युक्त असा सुबक आकार देणे आवश्यक असते, पण अवकाशातल्या उपग्रहाचा आकार कसाही वाकडातिकडा असला किंवा त्यात अनेक कोपरे किंवा पसरट पृष्ठभाग असले तरी ते चालते, कारण तिथे हवेचा विरोध नसतो.

हे उपग्रह वेगवेगळ्या आकारांच्या कक्षांमधून पृथ्वीभोवती घिरट्या घालतात. कांही कक्षा वर्तुळाकार असतात, कांही थोड्या लंबगोलाकार असतात, तर कांही जास्त लंबवर्तुळाकार असतात. उपग्रहांच्या  कक्षा मुख्यतः तीन प्रकारच्या मानल्या जातात, एल ई ओ Low Earth Orbit , एम ई ओ Medium Earth Orbit  आणि जी ई ओ. Geostationary Orbit. पृथ्वीच्या जवळून फिरणाऱ्या एलईओ सॅटेलाइट्सना अवकाशात राहण्यासाठी प्रचंड वेगाने फिरून सुमारे दीड ते दोन तासात एक पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करावी लागते, पण पृथ्वीपासून ३६००० किलोमीटर अंतरावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणशक्तीचे बल क्षीण झालेले असल्यामुळे तिथे असलेला जीईओ उपग्रह सावकाशपणे म्हणजे पृथ्वीच्याच अंशात्मक वेगाने फिरू शकतो. मधल्या भागात फिरणारे उपग्रह पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आणि उपग्रहाचा वेग या दोन्ही गोष्टींच्या परिणामांनुसार आपले पृथ्वीपासूनचे अंतर राखतात.

पृथ्वीपासून कुठल्याही ठराविक अंतरावर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण स्थिर असते, पण तिथून जात असलेल्या उपग्रहाचा वेग कांही कारणांमुळे कमी होऊ शकतो. अत्यंत विरळ हवेतले कांही तुरळक अणु  त्याला धडकत असतात, तसेच त्याच्याकडून सूर्याचे प्रकाशकिरण शोषले जातांना किंवा ते त्याच्यावरून परावर्तित होतांना त्याला सूक्ष्म धक्का देतात हे कदाचित आपल्याला खरेसुध्दा वाटणार नाही. पण अशा कारणांनी त्याची गति मंदावते तेंव्हा तो हळूहळू पृथ्वीकडे ओढला जातो, पृथ्वीच्या जवळ येताच वातावरणाशी घर्षण होऊन तो ऊष्णतेमुळे नष्ट होतो किंवा टिकून राहिला तर पृथ्वीवर येऊन कोसळतो. उपग्रहाचे आयुष्य अमर्याद नसले तरी दीर्घ असते, पण त्यावर ठेवलेली उपकरणे काम करेनाशी झाली की त्याचे उपयुक्त आयुष्य संपते. त्यानंतर तो अंतराळातला निरुपयोगी कचरा होऊन जातो. त्याची विल्हेवाट कशी लावायची यावरही संशोधन चालले आहे.

उपग्रहाचे उद्दिष्ट आणि त्याने करायची असलेली कामगिरी यावरून त्याला कोणत्या कक्षेत ठेवायचे हे ठरवले जाते. पृथ्वीवरील जमीन, समुद्र, ढग, हवामान वगैरेंचे निरीक्षण आणि संशोधन करणारे उपग्रह लो अर्थ ऑर्बिटमध्ये असतात. ते निरनिराळ्या दिशांनी वेगवेगळ्या अंशात्मक कक्षांमधून फिरवता येऊ शकतात. जमीनीपासून फार जवळ असल्यामुळे एक उपग्रह एका वेळी पृथ्वीचा थोडाच भाग पाहू शकतो.  एकाच क्षणी जगाच्या निरनिराळ्या भागांमध्ये काय चालले आहे हे समजून घेण्यासाठी अशा उपग्रहांची साखळी तयार केली जाते. एकाद्या मोठ्या गोलाच्या जवळ जाऊन पाहिल्यास त्याचा जेवढा भाग दिसतो त्यापेक्षा दूर जाऊन पाहिल्यास त्याचा जास्त भाग दिसतो. त्याचप्रमाणे पृथ्वीपासून दूर असलेल्या कक्षेतील उपग्रह पृथ्वीच्या मोठ्या भूभागाशी संपर्क करू शकतात. सुमारे वीस हजार कि.मी.अंतरावरील कक्षांमध्ये फिरणारे उपग्रह दर बारा तासात एक प्रदक्षिणा घालतात. अशा उपग्रहांचा उपयोग  प्रामुख्याने नेव्हिगेशनसाठी होतो. या कारणाने जीपीएस सारख्या सेवा देणारे उपग्रह एमईओमध्ये ठेवले जातात. 

उपग्रहाला पृथ्वीपासून दूर असलेल्या कक्षेत पाठवण्यासाठी अधिक शक्तीशाली अग्निबाणांची आवश्यकता असते आणि लहान कक्षेत पाठवणे तुलनेने सोपे असते. कदाचित म्हणूनच सुमारे ८४% उपग्रह एलईओ मध्ये आहेत. त्यातले बहुतेक उपग्रह आकारानेही लहान आहेत. उपग्रहाने पृथ्वीवरून उड्डाण केल्यावर त्याला लगेच बरोबर आपल्या ठरलेल्या कक्षेत नेऊन ठेवणे अवघड असते. त्याला आपल्या कक्षेत राहण्यासाठी आवश्यक तितक्याच वेगाने भ्रमण करणेही गरजेचे असते. यासाठी जागा आणि वेग यात थोडीसी दुरुस्ती करण्यासाठी उपग्रहाबरोबर थ्रस्टर रॉकेट जोडलेले असतात. प्रत्येक उपग्रहाचे नियंत्रण जमीनीवरील नियंत्रण केंद्राकडून केले जात असते. उपग्रहांवरील थ्रस्टर रॉकेट इंजिने रिमोट कंट्रोलने सुरू किंवा बंद करता येतात. त्या योगे उपग्रहाचा वेग आणि कक्षा यात दुरुस्ती केली जाते.

जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये ठेवलेले  संदेशवहनासाठी उपयोगात येणारे उपग्रह विषुववृत्ताच्या बरोबर वर सुमारे छत्तीस हजार कि.मी.अंतरावरून पृथ्वीच्या अक्षाभोवती पृथ्वीइतक्याच वेगाने  पूर्वपश्चिम दिशेने  फिरत असतात. असे तीन उपग्रह संपूर्ण पृथ्वीला कव्हर करू शकतात. पृथ्वीवरून पाहता ते एकाच जागी स्थिर असल्यासारखे दिसतात. ते कधीही उगवत नाहीत की मावळत नाहीत. त्यामुळे एका जागी स्थिर असलेल्या पृथ्वीवरील अँटेनावरून त्या उपग्रहांबरोबर संदेशांची सतत देवाण घेवाण करता येते.  दूरध्वनि (टेलिफोन), दूरदर्शन (टीव्ही), आंतर्जाल (इंटरनेट) अशा अत्यावश्यक सेवा या उपग्रहांमार्फत पुरवल्या जातात. सध्या सुमारे १२% उपग्रह या प्रकारचे आहेत. 

याशिवाय सनसिन्क्रॉनस नांवाचा एक प्रकार आहे. हे उपग्रह उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरून पृथ्वीला प्रदक्षिणा घालतात. ते पृथ्वीच्या जवळून इतक्या वेगाने फिरतात की विषुववृत्तावरून निघून एक प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा विषुववृत्तावर येण्यासाठी त्यांना जेवढा वेळ लागतो तेवढेच स्थानिक वेळेमधले अंतर असते. उदाहरणार्थ हा उपग्रह भारतावरून जात असतांना इथे दहा वाजले असतील तर हा उपग्रह एक फेरी मारून येतो तेंव्हा तो दुबईवर असतो आणि तिथे त्या वेळी दहाच वाजले असतात. हे उपग्रह उत्तरदक्षिण फिरतात तेंव्हाच पृथ्वी पूर्वपश्चिम फिरत असते त्यामुळे पृथ्वीचा संपूर्ण पृष्ठभाग त्यांच्या नजरेखालून जात असतो. वातावरणाच्या अभ्यासासाठी अशा उपग्रहांचा वापर केला जातो. याशिवाय इतर उपग्रहांचेच निरीक्षण करण्याचे काम कांही उपग्रह करतात तर कांही उपग्रह राष्ट्रीय संरक्षणासाठी लागणारी माहिती गोळा करतात. असे उपग्रह सर्वच प्रकारच्या कक्षांमध्ये असतात.

भन्नाट वेगाने अवकाशात सतत फिरत राहणारे हे उपग्रह चुकून एकमेकांवर आदळत असतील का असा प्रश्न पडणे साहजिक आहे. त्याचे थोडक्यात उत्तर असे आहे. अंतराळातील पोकळी अतिविशाल आहे. त्या मानाने उपग्रह आकाराने खूपच छोटे असतात. ते मोटारीसारखे कुठल्या संकुचित रस्त्यावरून दाटीवाटीने जात नसतात. प्रत्येक लहानशा उपग्रहाच्या  चारही बाजूंना आणि वर खाली खूप मोठी मोकळी जागा असते. त्यामुळे दोन उपग्रह एकमेकांना धडकण्याची शक्यता अतीशय कमी असते. विशाल अवकाशाच्या विस्तीर्ण आकारमानाचा विचार करता सध्या तरी उपग्रहांची संख्या तशी फार मोठी नाही. शिवाय कोणताही उपग्रह उडवायच्या आधीच तो कशा प्रकारचा उपग्रह आहे आणि त्याने कोणती कामगिरी करायची आहे हे ठरवून त्यानुसार त्याची वेगळी कक्षा ठरवलेली असते. ती ठरवतांना अंतराळात आधीपासून असलेल्या उपग्रहांच्या कक्षांचा विचार केला जातो. उपग्रहांचे नियंत्रण करणाऱ्या जमीनीवरील केंद्रामधून त्याच्यावर सतत लक्ष ठेवले जात असते. इथूनच उपग्रहावरील रॉकेट इंजिन चालवून त्याची कक्षा किंवा मार्ग किंचित बदलता येतात. एकाद्या उपग्रहाला टक्कर होण्याचा धोका दिसल्यास रिमोट कंट्रोलनेच रॉकेट इंजिन चालवून त्या उपग्रहाची जागा किंचित बदलून संभाव्य टक्कर टाळता येणे शक्य असते. सध्या त्याची सहसा गरज पडत नाही, पण भविष्यकाळात जसजशी उपग्रहांची संख्या वाढत जाईल आणि अवकाशातला कचराही वाढत जाईल तसतसा त्यांची आपसात टक्कर होण्याचा धोका वाढत जाणार आहे.

उपग्रहांची टक्कर होण्याची शक्यता अत्यंत कमी असली तरी प्रत्यक्षात अशा घटना घडून गेल्या आहेत. कॉसमॉस २२५१ नावाचा एक रशियन उपग्रह १९९३मध्ये उडवला गेला होता आणि  कालांतराने त्याचा उपयोग संपला होता, तरी तो त्याच्या कक्षेत फिरत राहिला होता. अमेरिकेतील इरिडियम सॅटेलाइट या कंपनीसाठी इरिडियम ३३ नावाचा एक उपग्रह १९९८मध्ये उडवला गेला होता आणि तो बरीच वर्षे काम करत होता. निष्क्रिय झालेला कॉसमॉस २२५१ हा रशियन संप्रेषण उपग्रह १० फेब्रुवारी २००९ रोजी इरिडियम ३३ या  सक्रिय व्यावसायिक संप्रेषण उपग्रहाशी आदळला होता. यातला एक उपग्रह उत्तर दक्षिण दिशेने आणि दुसरा पूर्वपश्चिम दिशेने पृथ्वीला फेऱ्या घालत होता तरीही योगायोगाने ते एकाच वेळी एका बिंदूवर आले आणि एकमेकांना धडकले ही आश्चर्य वाटण्यासारखीच गोष्ट घडली. हे दोन्ही उपग्रह तासाला हजारो किलोमीटर्स एवढ्या प्रचंड वेगाने जात असल्यामुळे या अपघातात त्यांचा चक्काचूर होऊन त्यांचे जवळ जवळ दोन हजार तुकडे अवकाशात इकडे तिकडे पसरले. या दुर्घटनेनंतर अवकाशातील सगळ्याच उपग्रहांवर शक्य तेवढे बारीक लक्ष ठेवले जात आहे आणि त्यांच्या धडकण्याची संभाव्यता दिसली तर धोक्याचा इशारा दिला जातो. 

लो अर्थ ऑर्बिटमधले काही निकामी झालेले जुने उपग्रह किंवा अवकाशातल्या कचऱ्याचे तुकडे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे हळू हळू वातावरणात शिरून जळून जातात किंवा पृथ्वीवर येऊन कोसळतात. काही वर्षांपूर्वी अवकाशातले स्कायलॅब खाली जमीनीवर येऊन कोसळण्याची आणि त्यामुळे मोठे नुकसान होण्याची मोठी भीती सगळ्या जगाला पडली होती. अखेर ते समुद्रात कोसळले होते.  अशा प्रकारे अवकाशातला कचरा हळू हळू आपोआप थोडा कमी होत असला तरी त्याच्या वाढण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. ते कमी करावे आणि आधीच जमलेला कचरा गोळा करून खाली आणावा किंवा तिथल्या तिथेच नष्ट करावा यावर संशोधन चालले आहे.  अवकाशातल्या एकाद्या निरुपयोगी झालेल्या उपग्रहाला मुद्दाम ठरवून ठोकण्याचे अनेक प्रयोगही लक्ष्यवेधी रॉकेट्सचा उपयोग करून यशस्वी रीत्या केले गेले आहेत. ते पाहता भविष्यकाळातली युद्धेसुद्धा स्टार वॉर्स या मालिकेत दाखवल्याप्रमाणे अवकाशात लढली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.  तसे झाले तर त्याच्या क्रॉसफायरमध्ये अनेक इतर उपग्रहही सापडतील.

अंतराळातल्या विश्वाचे निरीक्षण करण्यासाठीसुद्धा या उपग्रहांचा उपयोग केला जातो. हबल टेलिस्कोप ही महाकाय दुर्बिण १९९० मध्ये पृथ्वीच्या जवळ म्हणजे सुमारे ६०० कि.मी.अंतरावर ठेवली आहे. ही दुर्बीण पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर असल्यामुळे वातावरण अथवा मानवनिर्मित प्रकाश यांचा अडथळा येत नाही. त्यानंतर २०२१ मध्ये जगातली सर्वात मोठी, सर्वात महागडी आणि अत्याधुनिक अशी  वेब स्पेस टेलिस्कोप नावाची अगडबंब आकाराची दुर्बिण तयार करून ती अंतराळात पाठवून दिली आहे. पृथ्वीपासून चंद्र जितक्या अंतरावरून फिरत असतो त्याच्याही तीन चार पट पलीकडे एल2 नावाच्या एका बिंदूवर या दुर्बिणीला ठेवले आहे. लॅग्रेंज पॉइंट्स ही अवकाशातील अशी स्थाने आहेत जिथे दोन मोठ्या वस्तुमानांचे गुरुत्वाकर्षण बल केंद्रापसारक बलाचे (Gravity and Centrifugal Force) संतुलन साधतात जेणेकरून लहान वस्तू त्या जागी राहते. इंधनाचा वापर कमी करण्यासाठी आणि अवकाशयानाला त्यांचे स्थान कार्यक्षमतेने राखण्यास अनुमती देण्यासाठी अंतराळयाने या बिंदूंचा वापर करतात.  संशोधकांनी सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधल्या  अशा पाच जागा शोधून काढलेल्या आहेत. त्यापैकीच एक जागा L2 ही पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर आहे. पृथ्वी किंवा चंद्र यांची सावली तिथपर्यंत पोचत नाही. या जागेवर ठेवलेली ही दुर्बीण पृथ्वीच्या बरोबरच सूर्याची प्रदक्षिणा करते आणि अवकाशातील दूर दूर असलेल्या ताऱ्यांचे निरीक्षण करून सगळी माहिती पृथ्वीवर राहणाऱ्या शास्त्रज्ञांना पुरवते. पण ही दुर्बीण पृथ्वीभोवती फिरत नसल्याने कदाचित तिची गणना उपग्रहांमध्ये होणार नाही.

या लेखामध्ये फक्त मानवरहित उपग्रहांची माहिती दिली आहे. यूएसए  आणि यूएसएसआर यांच्यात चाललेल्या स्पर्धेमध्ये रशीयाने युरी गागारिन या अंतराळवीराला  १२ एप्रिल १९६१ मध्ये अंतराळात पाठवायचा विक्रम केला आणि त्याच्या पाठोपाठ अमेरिकेने ५ मे १९६१ला अॅलन शेफर्डला अंतराळात पाठवले. रशीया आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रांनी त्यानंतर अनेक अंतराळवीरांना अंतराळात पाठवून त्यांना सुखरूपपणे पृथ्वीवर परत आणले आहे. अंतराळात पृथ्वीभोवती फिरत राहणाऱ्या स्कायलॅबमध्ये राहून नेहमीच काही शास्त्रज्ञ संशोधन करत असतात. ते निरनिराळ्या बॅचेसमधून तिथे जात आणि परत येत असतात.