Monday, May 06, 2024

हिंदी भजने आणि मराठी गीते

 निर्माता दिग्दर्शक राजा परांजपे यांनी जगाच्या पाठीवर नावाचा एक अफलातून चित्रपट दिला. त्यातली प्रमुख भूमिकाही त्यांनी स्वतः वठवली होती, पण ती एक उमदा आणि सुस्वरूप नायक म्हणून नव्हती. त्यांनी या सिनेमात एका दीन दुबळ्या सरळमार्गी माणसाच्या जीवनाची वाताहत होतांना  दाखवली होती. हा चित्रपट वेगळ्या कथेपेक्षाही त्यातल्या अनेक अप्रतिम गाण्यांमुळे खूप गाजला आणि आता सिनेमा विस्मरणात गेला असला तरी ती गाणी आजतागायत लोकप्रिय आहेत. त्यातली तीन गाणी एक अंध मुलगी रस्त्यात गात गात नाच करते. सीमाने ते काम छान केले आहे. पण रस्त्यात गायलेली ती तीनही गाणी आध्यात्मिक स्वरूपाची गाणी आहेत हे जरा आश्चर्यजनक वाटते. ग.दि.माडगूळकर हे या सिनेमाचे पटकथाकार आणि गीतकार असल्यामुळे त्यांनी ती गीते त्या गोष्टीत चपखलपणे बसवली आहेत. ती गाणी म्हणजे इतकी उत्कृष्ट काव्ये आहेत की त्यासाठी गदिमांच्या प्रतिभेला दाद द्यावीच लागेल.

पुढे मी जेंव्हा काही जुनी हिंदी भजने ऐकली तेंव्हा मला या गीतांची आठवण झाली. अशी मूळ हिंदी भजने आणि त्यावर गदिमांनी लिहिलेली मराठी गीते मी इथे देत आहे. 


१. सूरदासांचे भजन

अब मैं नाच्यौ बहुत गुपाल। . 

काम-क्रोध कौ पहिरि चोलना, कंठ बिषय की माल॥ 

महामोह के नूपुर बाजत, चलत असंगत चाल॥ 

भ्रम-भोयौ मन भयौ, पखावज, चलत असंगत चाल॥ 

तृष्ना नाद करति घट भीतर, नाना बिधि दै ताल। 

माया कौ कटि फेंटा बाँध्यौ, लोभ-तिलक दियौ भाल॥ 

कोटिक कला काछि दिखाराई जल-थल सुधि नहिं काल। 

सूरदास की सबै अविद्या दूरि करौ नँदलाल॥ 

हे गोपाल! अब मैं बहुत नाच चुका। काम और क्रोध का जामा पहनकर, विषयों की माला गले में डालकर, महामोह-ग्रस्त होने से निंदा करने में ही मुझे सुख मिलता है। मै नाचता रहा। भ्रम से भ्रमित मन ही पखावज (मृदंग) बना। कुसंगरूपी चाल मैं चलता हूँ। अनेक प्रकार के ताल देती हुई तृष्णा हृदय के भीतर नाद कर रही है। कमर में माया का फेटा बाँध रखा है ओर ललाट पर लोभ का तिलक लगा लिया है। जल-थल में स्वांग धारण कर कितने समय से (यह तो मुझे स्मरण नहीं) करोड़ों कलाएँ मैंने भली प्रकार दिखलाई हैं। हे नंदलाल! अब तो सूरदास का सारा अज्ञान दूर कर दो।

गदिमांचे गीत :

नाच नाचुनी अती मी दमले

थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला

निलाजरेपण कटीस नेसले, निसुगपणाचा शेला

आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला

उपभोगाच्या शतकमलांची कंठी घातली माला

थकले रे नंदलाला

विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला

अनय अनीती नुपूर पायी, कुसंगती करताला

लोभ प्रलोभन नाणी फेकी मजवर आला गेला

थकले रे नंदलाला

स्वतःभोवती घेता गिरक्या अंधपणा की आला

तालाचा मज तोल कळेना, सादही गोठून गेला

अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला

थकले रे नंदलाला

-----

२. संत मीराबाईचे भजन

माई री! मैं तो लियो गोविंदो मोल।

कोई कहै छानै, कोई कहै छुपकै, लियो री बजंता ढोल।

कोई कहै मुहंघो, कोई कहै सुहंगो, लियो री तराजू तोल।

कोई कहै कारो, कोई कहै गोरो, लियो री अमोलिक मोल।

या ही कूं सब जाणत है, लियो री आँखी खोल।

मीरा कूं प्रभु दरसण दीज्‍यो, पूरब जनम को कोल।


गदिमांनी लिहिलेले गीत

नाहि खर्चिली कवडीदमडी, नाहि वेचला दाम

विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम !

कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी

जन्मभरीच्या श्वासाइतुके मोजियले हरिनाम !

बाई मी विकत घेतला श्याम !

बाळ गुराखी यमुनेवरचा, गुलाम काळा संतांघरचा

हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम !

बाई मी विकत घेतला श्याम !

जितुके मालक, तितुकी नावे, हृदये तितुकी, याची गावे

कुणि न ओळखी तरिही याला दीन अनाथ अनाम !

बाई मी विकत घेतला श्याम !

-----

३. सूरदासांचे भजन 

श्रीकृष्ण गोकुळ सोडून मथुरेला जातो आणि तिकडेच राहतो. त्याची वाट पहात बसलेल्या प्रिय गोपींची समजूत घालण्यासाठी तो उद्धवाला वृंदावनाला पाठवतो. श्रीकृष्णाला दोष न देता आपल्या नशीबाला दोष देत त्या गोपी असे म्हणतात,

ऊधौ, कर्मन की गति न्यारी।

सब नदियाँ जल भरि-भरि रहियाँ सागर केहि बिध खारी॥

उज्ज्वल पंख दिये बगुला को कोयल केहि गुन कारी॥

सुन्दर नयन मृगा को दीन्हे बन-बन फिरत उजारी॥

मूरख-मूरख राजे कीन्हे पंडित फिरत भिखारी॥

सूर श्याम मिलने की आसा छिन-छिन बीतत भारी॥

भावार्थ :- गोपियाँ भगवान कृष्ण के प्रति अपने प्रेम के प्रतिदानस्वरूप विरह को प्राप्त करती हैं। लेकिन वे इसे विधि का विधान कहकर आश्वस्त रहती हैं। वे ऊधो से कहती हैं कि हे ऊधो, प्रकृति का नियम एकदम उलटा है। धरती पर जितनी भी नदियाँ हैं वे सब की सब अपना मीठा जल सागर में डाल रही हैं लेकिन वह फिर भी खारा ही है। छद्म-तपस्वी बगुले को उसने सफेद रंग दिया है जबकि मीठा बोलने वाली कोयल को काला बना दिया। सुन्दर नेत्रों वाला हिरन जंगल में मारा-मारा फिरता है। अनपढ़ लोग धन से खेलते हैं जबकि ज्ञानी लोग अपना जीवन भीख माँगकर पूरा करते हैं। सूरदास कहते हैं कि गोपियों ने कहा--इसी तरह श्याम से मिलने की हमारी इच्छा जितनी बढ़ती जाती है, उतना ही यह वियोग हमें भारी प्रतीत होता है।

याला थोडीशी वर्तमानकाळाची जोड देत ग.दि.माडगूळकरांनी असे गीत लिहिले आहे. या गीतात त्यांनी वेगळी उदाहरणे दिली असली तरी मुख्य मुद्दा तोच ठेवला आहे.

उद्धवा, अजब तुझे सरकार !

लहरी राजा, प्रजा आंधळी अधांतरी दरबार !

इथे फुलांना मरण जन्मता

दगडाला पण चिरंजीविता

बोरिबाभळी उगाच जगती चंदनमाथि कुठार !

लबाड जोडिति इमले माड्या

गुणवंतांना मात्र झोपड्या

पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार !

वाइट तितुके इथे पोसले

भलेपणाचे भाग्य नासले

या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार !

ग.दि.माडगूळकर

चित्रपट - जगाच्या पाठीवर

---

"उधो करमनकी गति न्यारी" याच सूरदासाच्या  भजनाचे तंतोतंत रूपांतर कवयित्री शांता शेळके यांनी असे केले आहे.

दैव किती अविचारी

उधो ! जीवनगति ही न्यारी

शुभ्रवर्ण बगळ्यास दिला तू

कोकिळतनू अंधारी;

कृष्णलोचन सुंदर हरिणे

वनि वनि भ्रमति बिचारी

मूर्ख भोगितो राजवैभवा

पंडित फिरत भिकारी

सूरदास विनवितो प्रभूला

क्षण क्षण हो जड भारी

गीत - शान्‍ता शेळके

संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी

स्वर - रामदास कामत

नाटक - हे बंध रेशमाचे

गीत प्रकार - नाट्यसंगीत

-----

जगाच्या पाठीवर हा चित्रपट आला होता त्या साठ वर्षांपूर्वीच्या काळात उद्धव नावाचा कोणी पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री नव्हता आणि इतिहासात किंवा पुराणातही उद्धव नावाचा कोणी राजा नाही. मग माडगूळकरांनी "उद्धवा अजब तुझे सरकार" असे शब्द का लिहावेत? हे मला गूढच वाटले होते. नंतर ते सूरदासांच्या भजनावरून उलगडले. 

 उद्धव आणि अक्रूर नावाची मथुरेतली दोन महत्वाची पात्रे भागवतपुराणात आहेत. यातल्या अक्रूराने फक्त कृष्णाला गोकुळातून मथुरेला नेण्याचे काम केले. उद्धव कृष्णाचा सखा म्हणून जन्मभर त्याच्यासोबत राहिला.  शेवटी अवतार समाप्त करण्याच्या आधी श्रीकृष्णाने उद्धवाला केलेला उपदेश उद्धवगीता या नावाने ओळखला जातो. त्यानंतर फक्त उद्धवाचा निरोप घेऊन श्रीकृष्ण अरण्यात गेला. मग पुन्हा एकदा उद्धवाने कृष्णाचा निरोप त्याच्या प्रियजनांना सांगितला अशी कथा आहे.  मध्वमुनीश्वर या जुन्या काळातल्या संतांची एक रचना माझ्या लहानपणी लोकप्रिय होती. माझ्या आईच्या काळातल्या बायका हे गाणे म्हणत असत. या गाण्यात श्रीकृष्णाने उद्धवाची काकुळतीने विनवणी केली आहे.

उद्धवा शांतवन कर जा त्या गोकुळवासि जनांचें ॥ध्रु०॥

बा नंद यशोदा माता मजसाठीं त्यजितिल प्राण । 

सांडुनी प्रपंचा फिरती मनिं उदास रानोरान । 

अन्नपाणी त्यजिलें रडती अति दुःखित झाले दीन । 

(चाल बदल) जन्मलों तैंहुनि झटले । 

कटि खांदे वाहतां घटले ।

 मजलागीं तिळतिळ तुटले । 

आटलें रक्त देहाचें ॥१॥

आईबाप त्यजुनी बाळें मजसंगें खेळत होतीं । 

गोडशा शिदोर्‍या आणुनी आवडीनें मजला देती । 

रात्रंदिस फिरले मागें दधि गोरस चोरूं येती । 

(चाल बदल) मी तोडुनि आलों तटका । 

तो जिवा लागला चटका । 

मजविण त्या युगसम घटका । 

आठवतें प्रेम तयांचें ॥२॥

पतिसुतादि गृहधन त्यजिलें मजवरती धरुनी ममता । 

मानिलें तुच्छ अपवर्गा मजसंगें निश्चळ रमतां । 

मद्दत्तचित्त त्या गोपी नेत्रांतरिं लेवुनि समता । 

(चाल बदल) तिळतुल्य नाहिं मनिं डगल्या । 

दृढ निश्चय धरुनी तगल्या । 

बहुधा त्या नसतील जगल्या । 

भंगले मनोरथ ज्यांचे ॥३॥

हरि आहे सुखरूप म्हणुनी भेटतांचि त्या सांगावें । 

सांग कीं समस्ता पुसिलें प्रत्युत्तर त्या मागावें । 

कथुनिया ज्ञान तयातें सांग कीं शोक त्यजावें । 

(चाल बदल) हें कार्य नव्हे तुजजोगें । 

मजसाठीं जावें वेगें । 

हे मध्वमुनीश्वर सांगे । 

त्या नपवे ज्ञान जयाचें ॥४॥

-----