Monday, January 31, 2011

संगीत साधना - पूर्वीच्या काळातली आणि आताची परिस्थिती (भाग १)

या महिन्यात दिवंगत झालेले स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी आणि नटवर्य प्रभाकर पणशीकर या दोघांनीही त्यांच्या घरातल्या वडीलधारी लोकांच्या विरोधात जाऊन, एक प्रकारचे बंड पुकारून कलेची साधना, किंबहुना त्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. याबद्दल बराचसा तपशील मी आतापर्यंत वेळोवेळी ऐकला किंवा वाचला होता. या वेळी तो पुन्हा छापून आला, तसेच मीडियावर झालेल्या चर्चांमध्ये सांगितला गेला. भीमसेनजी वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडून संगीतशिक्षणासाठी बाहेरच्या जगात निघून गेले होते हे आता सर्वांना माहीत आहे. पण त्यांना संगीताचे बाळकडू त्यांच्या घरीच मिळाले होते, घरात त्यांच्या कानावर पडलेल्या सुरांमुळेच त्यांना बालवयातच संगीताची गोडी लागली होती, ते शिकण्याची उत्कट प्रेरणा त्यातूनच मिळाली होती, मग त्यासाठीच त्यांना आपले ते घर सोडण्याचा एवढा टोकाचा धाडसी निर्णय कां घ्यावा लागला होता?

आजच्या जगात शहरातल्या कॉस्मोपॉलिटन वस्तीतल्या सेल्फकन्टेन्ड ब्लॉकमध्ये, म्हणजे स्व.पु.ल.देशांडे यांच्या भाषेत 'बंद दरवाजाच्या' पण खूप मोकळ्या विचारांच्या संस्कृतीत राहणा-या लोकांना या विरोधाभासाचा नीटसा उलगडा कदाचित होणार नाही. पण भीमसेनजींच्या उत्तर कर्नाटक प्रदेशातला साठ वर्षांपूर्वीचा कालखंड मी स्वतः अनुभवला असल्यामुळे मला तो निदान किंचित तरी समजू शकतो. त्या काळात घरात विजेचे दिवे नव्हते, पाण्याचे नळ नव्हते, रेफ्रिजरेटर, टेलीव्हिजन, वॉशिंग मशीन यासारख्या कसल्याच यांत्रिक सुखसोयी नव्हत्या. सर्वसामान्य माणसाचे जगणे आजच्या तुलनेत शारीरिक दृष्टीने कष्टमय होते. रोज पहाटे झुंजूमुंजू उजाडले की सारे जण उठायचे, दरवाजा उघडून अंगणात सडारांगोळी घालायची आणि कामाला लागायचे. त्यानंतर रात्र होईपर्यंत घराचा दरवाजा उघडाच असे. एकत्र कुटुंबातल्या घरात भरपूर माणसे असत आणि आजूबाजूच्या सगळ्या शेजा-यांचे दरवाजे उघडेच असल्यामुळे एका घरात खुट्ट झाले तरी ते सर्वांना समजत असे आणि काय झाले ते पहाण्यासाठी आणि गरज असल्यास मदतीसाठी सर्वजण धावून येत असत. गावातली सगळी माणसे ओळखीची असायची. त्यामुळे दिवसा ढवळ्या कोणी अज्ञात चोर घरात शिरेल अशी शक्यताच नव्हती. घरातला सगळा कारभार उघड असल्यामुळे तो सर्वांच्या समोर असे आणि "लोक काय म्हणतील?" या प्रश्नाला जबरदस्त महत्व होते.

त्या काळच्या समाजात टोकाचा जातीभेद होता. मात्र याचा अर्थ भिन्न जातींमध्ये वितुष्ट होते असा नाही. पण बहुतांश लोक आपापल्या जातीजमातीच्या लोकांमध्येच राहणे पसंत करत असत. त्यामुळे खेड्यापाड्यांमध्ये जातीनिहाय वस्त्या, वाडे, गल्ल्या किंवा आळी असत. परंपरागत लोकसंगीताचे सुध्दा ध्रुवीकरण झाले होते. ज्या भागात श्लोक किंवा स्तोत्रांचे पठण किंवा घंटानाद आणि झांजांच्या साथीने आरत्या म्हंटलेल्या ऐकू येत असत त्या भागात ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर उच्चारलेले लावणीचे शब्द कधीच ऐकू आले नसते. मराठी संतांची अभंगवाणी आणि कानडी संतांची पदे मात्र याला अपवाद होती. विठोबा पांडुरंगाच्या भजनात सगळे सामील होत असत. ग्यानबा तुकोबांचे अभंग घराघरात गायले जात असत. त्या काळातला स्त्रीवर्ग अजीबात घराबाहेर पडत नसला तरी घरातल्या घरात आणि शेजारणी-पाजरणींच्या घोळक्यात त्यांचे लोकसंगीत बहराला येत असे.

बाल भीमण्णांच्या आईला मधुर स्वरांची स्वर्गीय देणगी लाभलेली होती. संत पुरंदरदासादिकांची भजने ती तन्मयतेने गात असे. त्या गायनाचा सार्वजनिक प्रयोग करणे त्या काळात वर्ज्य असले तरी घरातल्या भीमण्णांच्या कानावर ते पडत होतेच आणि कुशाग्र बुध्दीमत्तेमुळे त्यांनी ती पदे आत्मसात केली होती. त्याशिवाय भजन, कीर्तन वगैरेंमधून त्याचे संगीताचे श्रवण होत होतेच. क्वचित कधी शास्त्रीय संगीत ऐकण्याची संधीसुध्दा मिळत असे. त्याने तो इतका भारावून गेला की असे दिव्य संगीत आपल्यालासुध्दा शिकायलाच पाहिजे असे त्याच्या मनाने घेतले.

लहान मुलाची इच्छा काय आहे ते पाहून ती पुरवायची पध्दत त्या काळी नव्हती. त्याच्या हिताच्या दृष्टीने त्याने काय शिकावे ते घरातली वडिलधारी मंडळीच पहात असत. परंपरागत रूढ समजुतींप्रमाणे जोशांच्या मुलाने संस्कृत शिकून वेदशास्त्रसंपन्न व्हावे, शास्त्री पंडित म्हणून मिरवावे ही अपेक्षा असेल. सत्तर ऐंशी वर्षापूर्वीच्या त्या काळातला नवा रोख पाहून त्या काळात तो इंग्रजी शिकून वकील किंवा सरकारी ऑफिसर झाला असता तर त्याने चांगले यश कमावले असते, शिक्षक झाला असता, रेल्वे, पोस्ट ऑफिस किंवा मामलेदार कचेरीत नोकरीला लागला असता तरी त्याला मान होता. गाणे बजावणे हे काही प्रतिष्ठित लोकांचे काम नव्हते. कलावंत या शब्दाला मान नव्हता, कलावंतीण हा तर अपशब्द होता. भीमसेन जर आधी व्यवस्थितपणे सरधोपट मार्गाला लागला असता आणि त्याने आपला शौक पुरा करण्यासाठी थोडे गायन वगैरे केले असते तर ते कदाचित त्याच्या घरच्यांना चालले असते. त्या काळातल्या समाजात देवाला प्रसन्न करण्यासाठी कोणी त्याचे गुणगान संगीतामधून केले तर त्याचे कौतुक होते, पण माणसांचे मनोरंजन करणे अत्यंत कमीपणाचे मानले जात असे. गायक वादक वगैरे मंडळी संस्थानिक, सरदार, जहागिरदार वगैरेंच्या पदरी असत. फारशी प्रसारमाध्यमेच अस्तित्वात नसल्यामुळे त्यांना लोकाश्रय नव्हता. देवल किर्लोस्कर वगैरेंच्या प्रयत्नामुळे नाटक कंपन्या चालत होत्या. संगीत शिकलेला मुलगा फार फार तर गायक नट बनू शकेल एवढीच त्याची झेप अपेक्षित होती. पण त्यालाही नाके मुरडणारेच अधिक होते.

अशा त्या काळात लहानग्या भीमाला शास्त्रीय संगीत शिकायचा ध्यास लागला. त्यासाठी घरी कोणीही त्याला पाठिंबा दिला नसता, त्याची व्यवस्था करणे अशक्यप्राय होते. गावात राहून त्या शिक्षणाची सोय होणे शक्य नव्हते. त्यासाठी परगावी जाऊन रहायला परवानगी मागितली असती तरी ती मिळाली नसती, उलट त्यात नक्कीच खोडा घातला गेला असता. असा विचार केल्यानंतर गुपचुपपणे घरातून पळून जाणे हा एकमेव पर्याय त्याला दिसला आणि तो पत्करून त्याचे होतील ते सारे परिणाम भोगण्याचे अतुलनीय मनोधैर्य अकरा वर्षाच्या वयात त्यांनी दाखवले. ते जर जवळपासच्या गावात गेले असते तर लगेच सापडले गेले असते, म्हणून मुद्दाम दूरवरच्या गावांमध्ये फिरत राहिले आणि कणाकणाने संगीतविद्या वेचत राहिले. त्यात थोडेफार यश मिळाल्यानंतर आपल्या गावाजवळच असलेल्या कुंदगोळ गावी जाऊन ते पं.रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाई गंधर्व यांचेकडे गेले आणि मनोभावे त्यांची सेवा करून त्यांचे पट्टशिष्य झाले.

. . . . . . . . . (क्रमशः)

Friday, January 28, 2011

सांगकाम्या

फक्त कोणी सांगेल तेवढेच काम करणा-या माणसाला सहसा कामच मिळत नाही. स्वतः पुढाकार घेऊन काम करणारे लोक सर्वांना हवे असतात. याचे एक उदाहरण पहा.

एक 'सांगकाम्या' माणूस होता. त्याला सांगितलेले काम तो मन लावून करत असे, पण देवाने त्यालासुध्दा एक डोके दिले आहे आणि ते केवळ टोपी ठेवण्यासाठी नाही या गोष्टीचा त्याला पत्ताच नव्हता. त्याचा जबरदस्त वशीला असल्यामुळे भिडेखातर त्याला कोणी ना कोणी आपल्या पदरी ठेवून घेत असे आणि त्याच्याकडून जमेल तसे काही काम करवून घेण्याची धडपड करीत असे. एकदा एका वर्तमानपत्रात त्याला वार्ताहराचे काम दिले गेले. त्याच्याकडे चौकस वृत्तीचा गंधही नसल्यामुळे तो स्वतःहून बातम्या गोळा करेल अशी अपेक्षा नव्हतीच. नाटक, सिनेमे, सभा, संमेलने, समारंभ अशा ठिकाणी जाऊन मजा करता करता तिथला ठरलेला कार्यक्रम कसा झाला, तिथे कोण कोण मंडळी आली होती, सजावट कशी केली होती, खायला प्यायला काय काय होते वगैरे मजकून लिहायचे सोपे काम त्याला दिले गेले.

एकदा शहरातल्या एका मोठ्या माणसाच्या मुलीचे लग्न होते. नेहमीप्रमाणे त्या जागी त्याला पाठवले गेले. दुसरे दिवशी सकाळी इतर सर्व वर्तमानपत्रांच्या मुखपृष्ठावर तिथे घडलेल्या घटनांविषयीची बातमी आठ कॉलमी ठळक मथळ्याने छापून आली, पण आपल्या हीरोच्या वृत्तपत्रात त्याचा साधा उल्लेखसुध्दा नव्हता. संतापलेल्या संपादकाने त्याला बोलावून विचारले, "तुला त्या ठिकाणी पाठवले होते ना? एवढी महत्वाची बातमी देण्याचे काम तू का केले नाहीस?"
"मी तिकडे अगदी वेळेवर जाऊन पोचलो होतो."
"मग काय झालं?"
"एक दरोडेखोरांची टोळी आली, त्यांनी आधी वीज घालवून टाकली, त्यामुळे कोण कोण आले होते ते दिसलेच नाही."
"पुढे काय काय झालं?"
"काही नाही. त्यांनी नव-या मुलालाच गोळी घातली, तो मरून गेला. मग लग्न कसं होणार?"
"अरे हे एवढं रामायण घडलं, लगेच ऑफीसात येऊन ते आम्हाला का नाही सांगितलंस?"
"मला लग्नसमारंभाचं सविस्तर वर्णन द्यायचं काम सांगितलं होतं. लग्न तर झालंच नाही. कोणी जेवण सुध्दा वाढलं नाही. ते वायाच गेलं. म्हणून मी घरी गेलो, दोन घास जेवलो आणि झोपलो. त्यात माझं काय चुकलं?"

संपादकाने कपाळाला हात लावला.

Thursday, January 27, 2011

दोन सूर्य अस्तंगत झाले


मी मुंबईला आलो त्यावेळी दूरदर्शन सुरू झाले नव्हते. चित्रपटकलाकार तेवढे सिनेमाच्या पडद्यावर दिसत असत. रेडिओच्या खरखरीमधून थोडे फार संगीत कानावर पडत असे, पण त्या काळात हिंदी सिनेमातली गाणी आणि मराठीतले विविध प्रकारचे सुगम संगीत हे ऐकण्यावरच मुख्य भर असायचा. श्रुतिका या नावाने लहान लहान नाटके रेडिओवर लागत पण त्यात आकाशवाणी कलाकारांचा सहभाग असे. नाट्यव्यवसाय आणि शास्त्रीय संगीत या क्षेत्रामधील व्यक्तींचे दर्शन प्रत्यक्ष कार्यक्रमातच होत असे. अशा काळात या दोन क्षेत्रात आपल्या प्रतिभेच्या तेजाने डोळे दिपवून टाकणारे दोन सूर्य तळपत होते. संगीतभास्कर पंडित भीमसेन जोशी आणि नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर.

पणशीकरांचे एक नाटक पाहिल्यानंतर माझ्या मनावर त्याचा एवढा प्रभाव पडला की मग एकामागून एक जसजशी त्यांची नाटके येत होती ती पहातच राहिलो. पणशीकरांच्या नावातच अशी जादू होती की ज्या नाटकात त्यांनी अभिनय केला होता किंवा ज्या नाटकांची निर्मिती त्यांनी केली होती ती उच्च दर्जाची असणार आणि आपले पैसे वसूल होणार ही खात्री असे. तो मी नव्हेच मधला लखोबा लोखंडे असो, अश्रूंची झाली फुले मधला प्राध्यापक विद्यानंद असो किंवा इथे ओशाळला मृत्यूमधला औरंगजेब असो, या सर्व नाटकातल्या त्यांच्या भूमिका निगेटिव्ह असल्या तरी त्यांचाच प्रभाव दीर्घकाळ रेंगाळत असे. तो मी नव्हेच या नाटकात रूढ अर्थाने कोणी नायक असा नव्हताच. निपाणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे, बोगस कॅप्टन परांजपे, ढोंगी बुवाबाज राधेश्याम महाराज अशासारख्या पाच वेगवेगळ्या नावांनी एकच माणूस फसवाफसवी करत होता. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरामधील या पात्रांना सशक्तपणे उभे करून दाखवण्याची अद्भुत करामत पणशीकरांनी करून दाखवली.

फ्रभाकर पणशीकर ऊर्फ पंत हे अभिनयसम्राट तर होतेच, त्याशिवाय बरेच काही होते. त्यांनी निर्माता म्हणून मराठी नाट्यक्षेत्राला केलेले योगदान अतुलनीय आहे. कट्यार काळजात घुसली यासारखे दुसरे सर्वांगसुंदर संगीत नाटक मला तरी पाहिल्यासारखे आठवत नाही. पं.जितेंद्र अभिषेकी आणि स्व.वसंतराव देशपांडे यांच्या सांगीतिक कौशल्यामुळे ते गाजले हे खरे असले तरी त्याची निर्मिती पणशीकरांनी केली होती हेसुध्दा लक्षात आले आणि राहिले होते. देवल किर्लोस्करांच्या काळात नाटकाच्या रंगमंचावर निरनिराळे देखावे निर्माण करण्यासाठी फक्त पाठीमागे पडदे टाकले जात असत. भवन, बगीचा किंवा अरण्याचे चित्र त्यावर रंगवलेले असे. पणशीकरांच्या काळापर्यंत नेपथ्य, प्रकाशयोजना यासारख्या कल्पना अस्तित्वात आल्या होत्या. पण त्यांनी फिरता आणि सरकता रंगमंच यासारखे तांत्रिक कौशल्याचे प्रयोग करून प्रेक्षकांना नवनवे धक्कादायक अनुभव दिले.

नाट्यदर्पण रजनी हा कार्यक्रम बंद होईपर्यंत मी दरवर्षी न चुकता पहात होतो. नाट्यक्षेत्रातल्या कलावंतांना त्यांच्या भूमिकाशिवाय व्यक्ती म्हणून जवळून पहाण्याची संधीसुध्दा त्यात मिळत असे. दूरदर्शन आणि इतर वाहिन्यांवर झालेल्या अनेक चर्चा, मुलाखती वगैरेंमधूनदेखील अधून मधून पणशीकरांची भेट होत असे. त्यांच्या नेहमीच्या बोलण्या वागण्यातच एक आदब तसेच रुबाब दिसून येत असे. चर्चा करतांना ते आपला मुद्दा हिरीरीने मांडत असत. नाट्यक्षेत्राशी संबंधित असलेले सारे प्रश्न ते जनतेपुढे किंवा सरकारपुढे पोटतिडिकेने मांडतांना दिसत. पंतांना अगणित पुरस्कार मिळाले होतेच, शिवाय महाराष्ट्र शासनातर्फे त्यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार देण्यात येत होता. ज्या वर्षी भालचंद्र पेंढारकरांना हा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला त्यावेळी प्रभाकरपंतांनी केलेल्या भाषणात त्यांनी शासनालाच सुनावलेले परखड दोन बोल मला अजून आठवतात. मराठी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व, विवेचन करण्याची क्षमता, आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची शैली वगैरे त्यांचे अंगी असलेले गुण त्यांच्या वक्तृत्वात तसेच त्यांनी केलेल्या लेखनात दिसून येत असत. अशा प्रखर व्यक्तीमत्व असलेल्या सूर्याचे दर्शन आता होणार नाही.

भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्याबद्दल खूप लिहून आले आहे. त्यात आणखी भर घालण्याची माझी योग्यता नाही. माझ्या व्यक्तीगत जीवनात आलेल्या अनुभवावर आधारित त्यांचे एक व्यक्तीचित्र काढण्याचा एक दुबळा प्रयत्न मी या ब्लॉगवर पूर्वीच केला आहे. परवाच्या वर्तमानपत्रात पंडितजींच्या निधनाची बातमी आणि त्यांच्या संबंधी लेख, मुलाखती वगैरेंनी संपूर्ण जागा व्यापली होती. शोकाकुल होऊन सर्व जग जणु काही स्तब्ध होऊन बसल्यामुळे आदले दिवशी कुठेही कोणतीही घटना घडलीच नाही असे वाटले. रोज सकाळी कपातला चहा संपेपर्यंत हातातला पेपरसुध्दा त्यातल्या बातम्यांचे मथळे वाचून झाल्यानंतर हातावेगळा होत असे. त्यादिवशी मात्र त्याचे वाचन दिवसभर चालले होते.

चार वर्षांपूर्वी मी एकदा असे लिहिले होते, "जानेवारीचा शेवटचा आठवडा खरे तर आनंदाने भरलेला असायला हवा. आपला प्रजासत्ताक दिन या आठवड्यात येतो. संक्रांत होऊन गेलेली असली तरी तिळगुळाची चव अजून जिभेवर रेंगाळत असते. मुंबईमध्ये सुखद गुलाबी गारवा असतो. या काळात जिकडे तिकडे संमेलने, मेळावे, महोत्सव वगैरेंचा जल्लोष उडालेला असतो. सगळं वातावरण मस्त असते. पण कां कोणास ठाऊक, अशा आठवड्यातच मनाला चटका देणा-या कांही घटना घडून गेल्या. महात्माजींचा स्मृतिदिन याच आठवड्यात येतो, याच सकाळात कच्छमध्ये भयानक भूकंप आला आणि या वर्षी तीन मोठी माणसे एकदम आपल्याला सोडून गेली. माझ्या भावविश्वातले तीन तेजःपुंज तारे निखळले." संगीतकार ओ.पी.नय्यर, साहित्यिक कमलेश्वर आणि राष्ट्रभक्त नेते सदानंद वर्दे हे तीन चमचमते तारे एकापाठोपाठ एककरून लुप्त झाले होते. काही वर्षांपूर्वी पं.सी.आर.व्याससुध्दा या महिन्यातच दिवंगत झाले होते.

आता या वर्षीच्या नववर्षाच्या सुरुवातीला जानेवारी या पहिल्या महिल्यात दोन सूर्य अस्तंगत होऊन जबर धक्का बसला आहे.

Monday, January 24, 2011

भारतरत्न पं.भीमसेन जोशी


आज आपले प्रिय भीमण्णा आपल्यात राहिले नाहीत। त्यांना श्रध्दांजली म्हणून त्यांनी अजरामर केलेल्या अगणित गाण्यांपैकी काही गाण्यांचे शब्द आणि यू ट्यूबवरील दुवे देत आहे.


अभंगवाणी
माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी
बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई
पुंडलीक आहे बंधू त्याची ख्याती काय सांगू
माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा
एका जनार्दनी शरण करी माहेराची आठवण
http://www.youtube.com/watch?v=Fbxd_zndHhU

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देवविठ्ठल देवपूजा
माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल
गुरू विठ्ठल गुरूदेवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला म्हणून कळिकाळा पाड नाही
http://www.youtube.com/watch?v=Vobk4NI6WNw&NR=1

इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची
ज्ञानियांचा राजा भोगतो राणीव नाचती वैष्णव मागेपुढे
मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड अंगणात झाड कैवल्याचे
उजेडी राहिले उजेड होउन निवृत्ती सोपान मुक्ताबाई
http://www.youtube.com/watch?v=YZtb0zq6ikU&NR=1


टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग
दरबारी आले रंक आणि राव, सारे एकरूप नाही भेदभाव
गाऊ नाचू सारे होउनी निस्संग
जनसेवेपायी काया झिजवावी, घाव सोसुनीया मने रिझवावी
ताल देउनीया बोलतो मृदंग
ब्रम्हानंदी देह बुडूनिया जाय़ी एकएक खांब वारकरी होई
कैलासाचा नाथ झाला पांडुरंग
http://www.youtube.com/watch?v=5DLeSsL-FHw&NR=1


काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग
भावभक्ती भीमा उदक ते वाहे बरवा शोभतहे पांडुरंग
दया क्षमाशांती हेचि वाळवंट मिळालासे थाट वैष्णवांचा
ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद हाचि वेणुनाद शोभतसे
दश इंद्रियांचा एकमेळा केला ऐसा गोपाळकाला होत असे
देखिली पंढरी देही जनी वनी एका जनार्दनी वारी करी



भक्तीगीत

भीमसेन जोशी लता मंगेशकर- श्रीनिवास खळे
बाजे रे मुरलिया बाजे
अधर धरे मोहन मुरलीपर होठपे माया बिराजे
हरे हरे बाँसकी बनी मुरलिया मरममरमको छुए अंगुरिया चंचल चतुर अंगुरिया जिसपर कनकमुंदरीया साजे
पीली मुंदरी अंगुरी स्याम मुंदरीपर राधाका नाम
आखर देखे सुने मधुर स्वर राधा गोरी लाजे
भूल गयी राधा भरी गगरिया भूल गयी गोधनको चारिया
जाने न जाने ये वो जाने जाने रग जग जागे
http://www.youtube.com/watch?v=1TBmyHhmwDk&feature=related


शास्त्रीय संगीत

पं,भीमसेन जोशी
मियाकी मल्हार
ममदसारंगीलेरे तुमबिन मैका


मुलतानी
नैननमे आनबान
http://www.youtube.com/watch?v=eEgEqWDyJxA&feature=related

वृंदावनी सारंग
गाऊंमै तोरे बलिहारी
http://www.youtube.com/watch?v=S5GEIOlFJhg&feature=related

दरबारी कानडा
झनकनकवा मोरेबिचवा
http://www.youtube.com/watch?v=z_L4fiy1GA0&feature=related

यमनकल्याण
श्याम बजाये आज मुरलिया
http://www.youtube.com/watch?v=a24p1kBjrZ0&feature=related


भैरवी
जो भजे हरीको सदा वोही परम पद पावेगा
http://www.youtube.com/watch?v=Zm76KV-Vfu0&feature=related
http://www.youtube.com/watch?v=dsD3hBs6Ap0

भज मन रामचरम सुखदायी
http://www.youtube.com/watch?v=iqxEgpdNecM&feature=related




जुगलबंदी पं,भीमसेन जोशी डॉं बालमुरलीकृष्ण
मानस भजरे गुरुदेवम्
अमृतमधुरसंगीतसुधाकरम्
अमलगुणान्वितम्अद्भुतचरितम्
तंबुरवीणावंशीलोलम् त्यागराजगुरुस्वामीनम् सततम्
http://www.youtube.com/watch?v=OKtM1StoAco&feature=related

जुगलबंदी पं,भीमसेन जोशी डॉं बालमुरलीकृष्ण
तराना
तगिततिदतिंदनादतिदना
http://www.youtube.com/watch?v=NT1sFn3a7kE&NR=1


पं.भीमसेन जोशी
जयजगदीश्वरी मात सरस्वती
http://www.youtube.com/watch?v=SmFfhvYk-rQ


कन्नड पद

भाग्यदा लक्ष्मी बारम्मा
चित्रपटः NODI SWAMI NAAVIRODU HEEGE ... Sung my maestro pt.Bhimsen Joshi..lyrics by purandara dasaru.. feat: ananthnag shankarnag , julie lakshmi
http://www.youtube.com/watch?v=LqypyI0u390&feature=related

देवा बंदानम्म स्वामीबंदानो - पुरंदरदास
http://www.youtube.com/watch?v=Oh1m1VoMoAA&feature=related

पंडितजींना कोटी कोटी प्रणाम

Friday, January 14, 2011

मकरसंक्रांत



आज मकरसंक्रांत आहे. म्हणजे काय आहे हे सांगणारे लेख बहुतेक वर्तमानपत्रात आले आहेतच. माझ्या लहानपणी आमच्या घरात टिळक पंचांगाचा उपयोग केला जात असे. हे पंचांग वापरणारे फारच थोडे लोक गावात रहात असल्यामुळे ते मुद्दाम पुण्याहून मागवले जात असे. त्या काळात टिळकपंचांगातली संक्रांत दरवर्षी १० जानेवारीला येत असे. वर्षभरातले बाकीचे सारे सण तिथीनुसार येतात आणि दरवर्षी ते वेगळ्या तारखांना येतात, पण ही संक्रांत तेवढी इंग्रजी तारखेनुसार कशी येते याचे आश्चर्य वाटायचेच, शिवाय इतर पंचांगात ती १४ तारखेला येत असतांना टिळक पंचांगात चार दिवस आधी का येते याचे एक वेगळे गूढ वाटत असे. कदाचित देशभक्त टिळकांवर इंग्रजांचा राग असल्यामुळे ते लोक संक्रांतीला त्यांच्याकडे आधीच पाठवत असावेत.

संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून तिच्या फलाचे वाचन केले जात असे. घरातील सर्वांनी एकत्र बसून ते ऐकण्याची प्रथा होती. गणपतीचे वाहन उंदीर, शंकराचे नंदी याप्रमाणे सर्व देवदेवतांची वाहने ठरलेली आहेत, पण ही संक्रांत मात्र दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असे, शिवाय तिचे एक उपवाहन असे. ती कुठल्यातरी दिशेकडून येत असे आणि कुठल्यातरी दिशेला जात असे. शिवाय तिचे मुख तिसरीकडे असे आणि दृष्टी चौथ्या दिशेला. त्या सर्व दिशांना राहणा-या लोकांना त्यानुसार फळ मिळते अशी धारणा होती. या सर्व दिशा कोणत्या केंद्रबिंदूच्या सापेक्ष आहेत ते दिले नसल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार त्याचा अर्थ लावायला मोकळा होता. या सगळ्यातून काय अर्थ निघणे अपेक्षित आहे याचा मला आजपर्यंत पत्ता लागलेला नाही.

एकाद्यावर संक्रांत आली म्हणजे त्याचा आता विनाश किंवा निदान नुकसान तरी होणार असे समजले जाते. तिचा स्वभाव विध्वंसक आहे असे यात गृहीत धरले आहे. संक्रांतीची गणना दैत्य, राक्षस, असुर अशा वर्गात होत नाही तरीही असे का असावे कुणास ठाउक. तिला खूष करून आपला बचाव करून घेण्यासाठी तिळगुळाचा नैवेद्य दाखवला जातो की स्वतः बलवान होऊन येऊ घातलेल्या संकटांना सामोरी होण्यासाठी तो खाल्ला जातो हे ही स्पष्ट होत नाही. तिळातली स्निग्धता आणि गुळातला गोडवा यांच्यामुळे तो चविष्ट असतोच, शिवाय त्यात अनेक प्रकारचे शक्तीवर्धक गुण असल्यामुळे तो खाणे हे माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने किती हितकारक आहे याचे वर्णन करणारे लेख आता नियतकालिकांमध्ये वाचायला मिळतील. पण असे असेल ते बाराही महिने खायला काय हरकत आहे? थंडीच्या दिवसात शरीराला जास्त ऊर्जेची आवश्यकता असते असे असले तरी निदान महिनाभर आधीपासून थंडी पडायला लागलेली असते तेंव्हापासून तरी तिळ आणि गुळ खायला सुरू करावे. पुणे मुंबई दरम्यान प्रवास करणारे लोक मात्र वाटेत लोणावळ्याची चिक्की खाऊन वर्षभर संक्रांत साजरी करत असतात.

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीमधून मकर राशीत प्रवेश करतो. आभाळात सर्वांना दिसणारा सूर्य एकच असतो आणि स्पष्टपणे न दिसणा-या राशीसुध्दा समानच असाव्यात. असे असतांना टिळक पंचांगवाल्यांचा सूर्य चार दिवस आधीच मकरसंक्रमण कसे करत असेल असा प्रश्न मला लहानपणी पडत असे. धनु आणि मकर राशींमधल्या सीमारेषा काही आभाळात आंखून ठेवलेल्या नाहीत. काही सूक्ष्म निरीक्षणे आणि प्रचंड किचकट आकडेमोड करून गणिताच्या आधाराने ते ठरवले जाते. गणिताची पध्दत परंपरेनुसार ठरत गेली असल्यामुळे त्यात मतभेद असू शकतात. पूर्वीच्या काळात पंचांग तयार करणा-या ज्या विद्वानांबद्दल आदर वाटत असे किंवा त्यांच्या पध्दतीवर ज्यांचा विश्वास असे त्यानुसार लोक आपापली पंचांगे ठरवत असत. आजच्या राहणीमध्ये या गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. आताचे लोक फार फार तर कालनिर्णय कॅलेंडर पाहतात.

मकरसंक्रांतीच्या दिवशी दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते असे सांगितले जाते. हजार वर्षांपूर्वी कदाचित तसे होत असेल. मकरसंक्रांत माझ्या बालपणी इतर पंचांगांमध्ये १४ जानेवारीला येत असे, हल्ली ती १५ जानेवारीला येते. याचा अर्थ तिची तारीख हळू हळू पुढे जात आहे. मागे मागे गेल्यास कधी तरी ती २१ - २२ डिसेंबरला येत असावी. ग्रेगोरियन कँलेंडरमध्ये वेळोवेळी सुधारणा केली गेली असल्यामुळे वर्षातला सर्वात लहान दिवस (विंटर सोलस्टाइस) आजसुध्दा २१ किंवा २२ डिसेंबरलाच येतो. त्यानंतर दिवस मोठा होऊ लागतो आणि सूर्योदय व सूर्यास्ताला ज्या ठिकाणी सूर्याचे बिंब क्षितिजाला टेकतांना दिसते तो बिंदू उत्तरेच्या दिशेने सरकू लागतो.

पृथ्वीचा आंस वाटतो तेवढा स्थिर नाही. अत्यंत सूक्ष्म गतीने त्याचा तिरकसपणा बदलत असतो. यामुळे शेकडो वर्षांच्या कालावधीत क्षितिजावर दिसणा-या तारकांच्या स्थानांमध्येही किंचित बदल येत असतो आणि त्याच्या सापेक्ष दिसणारे राशीचक्र किंचित बदलत असते. यामुळे हा फरक येतो. राशीचक्रामध्ये फिरत रहाणारा सूर्य आणि ग्रह यांच्या भ्रमणावर आपले पंचांग पूर्णपणे आधारलेले असल्यामुळे विंटर सोलस्टाइस आणि मकरसंक्रांत आता वेगळ्या दिवशी येतात. धनु राशीमधून भ्रमण करत असतांनाच सूर्य दक्षिण दिशेने जाऊन टोकाला स्पर्श करून पुन्हा उत्तरेच्या दिशेने मार्गक्रमण करू लागतो.

Thursday, January 06, 2011

आत्याबाईला मिशा असत्या तर?

"आत्याबाईला मिशा असत्या तर? ......." असा एक प्रश्न मी शाळेत असतांना "म्हणी पूर्ण करा" या मथळ्याखाली परीक्षेत येत असे. तो वाचूनच आधी सर्वांना हंसू फुटत असे. आणि हंसून झाल्यानंतर ते तिची पूर्ती करत असत, " ..... तिला काका म्हंटले असते." शाळेच्या पुस्तकातल्या चित्रांवर वेगळे संस्कार करणे हा व्रात्य मुलांचा एक आवडता छंद असे. त्यात एकाद्या राणीला दाढीमिशा लावून तिचा राणा भीमदेव करणे किंवा एकाद्या राजाच्या कपाळाला रुपयाएवढे कुंकू लावून आणि कानात डूल वगैरे घालून त्याची पार 'सखूबाई' बनवणे वगैरे कल्पक प्रकार चालत असत.

१९६६ मध्ये जेंव्हा स्व.इंदिराजी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या त्या वेळी पं.नेहरूजींच्या अमदानीपासून मंत्रीमंडळात असलेली वजनदार ज्येष्ठ मंडळी त्यांच्या मंत्रीमंडळात होती. यापुढे त्यांच्या सल्ल्यानेच सगळा राज्यकारभार चालेल अशी समजूत झाल्यामुळे स्व.इंदिराजींना 'गूँगी गुडिया' हे नाव तत्कालीन शिष्ट लोकांनी दिले होते. लवकरच इंदिराजींनी आपला पराक्रम दाखवला आणि सर्व जुन्या खोडांना बाजूला सारून सत्ताधारी पक्षाची नव्याने उभारणी केली आणि त्याला प्रचंड बहुमताने निवडून सत्तेवर आणल्यानंतर त्यांनी नवे चेहेरे मंत्रीमंडळात आणले. ज्या काळात त्या सर्वसत्ताधीश बनल्या होत्या तेंव्हा एका विरोधी पक्षाच्या नेत्याने त्या सरकारामधल्या 'एकमेव पुरुष' आहेत असे तिरकस विधान केले होते.

आपले टपालखाते आता शंभर वर्षाहून जुने झाले आहे. त्याचे नवे बालपण सुरू झाले आहे असे म्हणायचे की त्याला त्या विरोधी नेत्याची आठवण झाली म्हणावे असे वाटण्यासारखी एक गोष्ट नुकतीच घडली. मला पोस्टाने आलेल्या एका पाकीटावरील तिकीटावर असा शिक्का पडला आहे की त्यामुळे काय परिवर्तन झाले आहे ते तुम्हीच पहा !

.

.
.
.
.
.
.
.
.
.

Wednesday, January 05, 2011

शुभंकरोती

महिनो-महिने किंवा वर्षानुवर्षे चालत राहणा-या टीव्हीवरल्या मेलोड्रामॅटिक मालिका मी इमानदारीने नियमितपणे पाहू शकत नाही. पण घरातला टीव्ही चालू असतांना मुद्दाम उठून दुस-या खोलीत जाऊन बसत नाही. त्यामुळे कधी कधी त्या सीरीयल्यमधले काही प्रसंग नजरेसमोर येतात आणि हळू हळू त्यातील मुख्य पात्रे ओळखीची वाटायला लागतात. 'शुभंकरोती' या नावाची एक मराठी मालिका मागल्या वर्षी येऊन गेली होती. तिची अशीच तोंडओळख झाली होती. चाकोरीबाहेरच्या आणि काहीशा अवास्तव अशा तिच्या कथाभागात चमत्कार, भुताटकी, करणी, कुंडली, भविष्यवाणी असले अतार्किक प्रकार नव्हते, अवास्तव वाटणा-या व्यक्तीरेखासुध्दा सपाट किंवा उथळ वाटत नव्हत्या. त्यांच्या अंगात वेगवेगळ्या प्रमाणात असलेले गुणदोष एकमेकांशी सुसंगत वाटायचे. वेळोवेळी बसणारे धक्के सुसह्य असायचे. घरातले चित्रण दाखवणारे सेट्स उघडउघडपणे कृत्रिम वाटत नव्हते. अशा कारणांमुळे ही मालिका एका बाजूने कुठे तरी वास्तवाला धरून चालली आहे असे मला वाटत होते.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तिची कथा उत्कंठेच्या शिगेला (क्लायम्रक्सला) पोचली होती. आठवडाभरात ती संपणार असे मला वाटू लागले होते. नेमक्या त्याच वेळी आजारपणामुळे मी आठवडाभर टीव्ही पाहूच शकलो नाही. हॉस्पिटलमध्ये करमणुकीचे दुसरेही कोणतेच साधन नसल्यामुळे अंथरुणावर पडल्या पडल्या विचारचक्र फिरवीत राहणे एवढेच करणे शक्य होते. वेळ घालवण्यासाठी मी त्या मालिकेत आता पुढे काय झाले असेल याचा विचार करू लागलो. असे झाले असेल की तसे घडले असेल असे करता करता माझ्यापुरती मीच त्या मालिकेची सूत्रे हातात घेतली आणि माझ्या कल्पनेनुसार तिचा शेवट करून टाकला. विस्कळित झालेले सारे धागे जुळून यावेत यासाठी प्रसंग मोजके टाकून सर्व मुख्य पात्रांना त्यात ओढून आणले. मला समजलेल्या त्यांच्या व्यक्तीरेखांनुसार संवाद त्यांच्या तोंडी घातले. मनातल्या मनात केलेला असा हा एक प्रयत्न घरी आल्यानंतर मी टंकन करून '***** कल्याणम्' या मथळ्याखाली ब्लॉगवर चढवून दिला.

हॉस्पिटलमधून घरी परत आल्यावर मी पाहिले होते की ती मालिका अजून संपलेली नव्हती, तर एक विचित्र वळण घेऊन वेगळ्याच दिशेने चालली होती. पण त्या मार्गाने ती फार लांबवर गेली नाही. महिनाभरातच वेगळ्या प्रकारे तिचा शेवट केला गेलाच. असे असले तरी मी केलेला शेवट आणि मालिकेत झालेला शेवट यात काही साम्यस्थळे दिसली. हा योगायोग होता की कथेची तशी मागणी होती ते माहीत नाही. पण आपण केलेला प्रयत्न अगदीच चुकीचा नव्हता याचे मला समाधान वाटले.

मी लिहिलेल्या कथेतली चिन्मयी घरीच बेशुध्द होऊन पडते, तिची मैत्रीण कौमुदी आणि भाऊ प्रशांत तिला कँसर हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. मालिकेतली किमया वेगळ्या जागी बेशुध्द होऊन पडते, आणि तिची तीच मैत्रीण, प्रियकर आणि तोच भाऊ तिला दवाखान्यात नेतात. माझ्या गोष्टीतला ऋषी आणि त्याची आई यांच्या मनातला चिन्मयीबद्दलचा गैरसमज दूर होतो आणि ते तिचा मनापासून पूर्णपणे स्वीकार करतात. तिला उपचारासाठी परदेशी पाठवायचे ठरवतात इथे माझी गोष्ट संपते. सीरीयलमध्ये त्यांचे झटपट लग्न लागते आणि त्यांना परदेशी घेऊन जाणारे विमान आकाशात उडते. चिन्मयीचे आजोबा अप्पासाहेब मनाचे पुरेसे खंबीर आहेत, ते चिन्मयीच्या आजाराचा धक्का सहन करू शकतील असे मी दाखवले होते, मालिकेत अखेर तसेच झाले. माझ्या कथेतल्या चिन्मयीची वहिनी स्वाती सोडून सुभेदारवाड्यातील इतर सारी मंडळी एकत्र येऊन चिन्मयीच्या पाठीशी उभे राहतात. त्यांना आपल्या वाईट वागणुकीचा पश्चात्ताप होतो असे माझ्या गोष्टीत दाखवले होते. मालिकेमध्ये ते तर होतेच, शिवाय त्या कपटी वहिनीलासुध्दा तिने केलेल्या अपराधांची खंत वाटते आणि तीसुध्दा पश्चात्ताप करण्यात इतरांमध्ये सामील होते. त्यामुळे शेवटी घरात कोणी व्हिलन रहात नाही.

मात्र मी रंगवलेला सस्पेन्स आणि पोलिसतपासणी वगैरे प्रकार मालिकेत घडत नाहीत. तिथेही पोलिस येतात, पण ते फारच वेगळ्या कारणासाठी. मालिकेतल्या काकाला कोर्टाकडून न्याय मिळतो आणि त्याचे गेलेले सगळे पैसे त्याला एकगठ्ठा परत मिळाल्यामुळे सुभेदारांचा आर्थिक प्रश्न सुटतो. त्याऐवजी आधीपासूनच गडगंज श्रीमंत असलेल्या ऋषीच्या बापाला उपरती होते आणि त्यानेच निर्माण केलेला आर्थिक पेचप्रसंग तोच स्वतः होऊन सोडवतो असे मी दाखवले होते. दोन्ही जागी त्यांच्या विवंचना दूर होतातच.

एकूण काय, तर या मालिकांमधल्या कथा अखेर कुठे जाऊन पोचतील याचा साधारण अंदाज घेता येतो आणि तो बराचसा बरोबर ठरतो.