Thursday, September 24, 2009

सप्तशृंगी देवी जगदंबा माता


आदिमायेचे महाराष्ट्रातले चौथे शक्तीपीठ नाशिकजवळील वणी येथे सप्तशृंग नावाच्या डोंगरमाथ्यावर आहे. त्या ठिकाणी कधीकाळी सात शिखरे असावीत असा एक तर्क आहे, तर सह्याद्री पर्वताच्या सात शिखरांमधील भागाला सप्तशृंग असे म्हणत असावेत असा दुसरा तर्क आहे. पुरुषाकडून मरण निळणार नाही असा वर मिळाल्यामुळे महिषासुर दैत्य फारच माजला होता. त्याने सरळ स्वर्गावर चढाई करून देवाधिराज इंद्राला तिथून हुसकून लावले होते. त्यामुळे तो ब्रह्मा विष्णू व महेश या त्रयींकडे मदतीची याचना करायला गेला. त्या तीघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली. ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. त्या वेळेस महिषासुर सप्तशृंगाच्या परिसरात होता. तिथेच जाऊन देवीने त्याचा वध केला आणि जगाला त्याच्या जाचातून मुक्त केल्यामुळे तिला जगदंब हे नांव प्राप्त झाले अशी कथा आहे. महिषासुरमर्दिनीची कहाणी इतर जागी सुध्दा सांगितली जात असल्यामुळे तो नक्की कुठल्या भागात होता ते समजत नाही. कदाचित त्याच्या नावाने आजपर्यंत प्रसिध्द असलेल्या म्हैसूर इथे त्याची राजधानी असेल आणि त्याचा वध दुसरीकडे झाला असेल. सप्तशृंग पर्वत रामायणकाळातील दंडकारण्याचा भाग होता. वनवासात फिरत असतांना श्रीरामचंद्रांनी या ठिकाणी येऊन सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले होते असे म्हणतात. ऋषी पराशर आणि मार्कंडेय यांनी या पर्वतावर तपश्चर्या केली होती अशा आख्यायिका आहेत.


तुळजापूर, कोल्हापूर आणि माहूर या तीन्ही शक्तीस्थानांपेक्षा वणी ही जागा मुंबईहून जवळ असली तरी या क्षेत्राबद्दल मी कुणाकडूनच फारसे कधी ऐकले नाही. तिथे जाऊन आलेले लोकही क्वचितच भेटले. नाशिकला गेलेले बहुतेक लोक वेळ मिळाल्यास त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन येतात, मीही आलो आहे, पण नाशिकलासुध्दा कुणीच मला वणीला जायचे सुचवले नाही. कदाचित या देवस्थानाला जाण्यासाठी खूप चढून जावे लागते म्हणून तिथे जाण्यासाठी लोक फारसे उत्सुक नसावेत.


माय भवानी तुझे लेकरु कुशीत तुझिया येई ।

सेवा मानून घे आई ।।

तू विश्वाची रचिली माया ।

तू शीतल छायेची काया ।

तुझ्या दयेचा ओघ अखंडित दुरित लयाला नेई ।।



तू अमला अविनाशी कीर्ती ।

तू अवघ्या आशांची पूर्ती ।

जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वाते नेई ।।



तूच दिलेली मंजुळ वाणी ।

डोळ्यांमधले निर्मळ पाणी ।

तुझ्या पूजना माझ्या पदरी याविण दुसरे नाही ।।

No comments: