Wednesday, April 22, 2009

ग्रँड युरोप - भाग ६ - रोममधील उरलेसुरले


दि.१६ व १७-०४-२००७ रोममधील उरलेसुरले


दि.१६ एप्रिलला ज्या दिवशी आम्ही मुंबईहून प्रयाण केले त्याच दिवशी योगायोगाने अलकाचा म्हणजे माझ्या पत्नीचा वाढदिवस होता. मध्यरात्रीनंतर आमचे विमान सुटणार असल्यामुळे आम्ही दि.१५च्या रात्रीच सहार विमानतळावर येऊन पोचलो होतो. प्रयाणकक्षात बसून विमानाची वाट पहात असतांनाच बरोबर रात्री बाराच्या ठोक्याला आमच्या ग्रुपमधल्या अद्वैतने आमच्याकडे येऊन अलकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. केसरीतर्फे दिलेल्या सहप्रवाशांच्या यादीमधून त्याने ही माहिती शोधून काढली होती. आजूबाजूला इतर एक दोघे बसलेले होते त्यांनीही शुभेच्छा दिल्या. त्या जागी तरी उत्तरादाखल धन्यवादाशिवाय आणखी कांहीच देता येणे आम्हाला शक्य नव्हते. रोमला पोचल्यावर विमानतळावर सामानाची वाट पहात असतांना, तसेच नंतर रोममध्ये फिरतांना आमच्या इतर सहप्रवाशांबरोबर जसजशी आमची ओळख होत गेली, तसतशी ही बातमीसुद्धा पसरत गेली व अधिक शुभेच्छा मिळाल्या.


अलकाचा या वर्षीचा वाढदिवस रोम येथे साजरा करायचा हे आमचे आधीपासून ठरलेलेच होते. हा वाढदिवसही एरवीपेक्षा वेगळा होता. इंग्रजी तारीख व मराठी पंचांगातील तिथी या दोन्ही पद्धतीने यंदा तो एकाच दिवशी आला होता. असे येणे हा एक दुर्मिळ योगायोग असत असावा असे मला पूर्वी वाटायचे. पण वर्षातील सगळ्याच तारखा व तिथी दर एकोणीस वर्षानंतर पुन्हा त्याच क्रमाने येतात असे एका ब्लॉगच्या निमित्तानेच या विषयाचा थोडा अभ्यास केल्यानंतर लक्षात आले होते. अलकाच्या सत्तावन्नाव्या वाढदिवसामुळे त्या पुस्तकी ज्ञानाची प्रत्यक्ष प्रचीती आली. मात्र त्या दिवशी आमचे आपल्या कुटुंबापासून दूर परदेशी असणे हा एक योगायोग होता. या वर्षी अनायासे नवीन मित्रमंडळींचा एक समूह त्या दिवशी एकत्र भेटणारच होता. त्याचा फायदा घेऊन त्या दिवशी थोडीशी मौजमजा करण्याचा आमचा विचार होता.
याआधी इंग्लंड व कॅनडाला गेलो असतांना तिथे त-हेत-हेचे आकर्षक केक दुकानांत ठेवलेले मी पाहिले होते. यामुळे या निमित्ताने रोममध्ये तसाच एखादा वैशिष्ट्यपूर्ण केक आणायचा विचार होता. पण नव्या देशातली कांही माहिती नाही आणि भाषेची अडचण यामुळे आपल्याला स्वतःला कांही शोधाशोध करता येण्यासारखे नव्हते. समूहाला सोडून एकट्याने फिरणे धोकादायक असल्यामुळे तसे करण्याला सक्त मनाई केलेली होती. अशा कारणाने मनातला विचार संदीपलाच बोलून दाखवला व कांही सहाय्य करण्याची विनंती केली. संध्याकाळी रोममध्ये फिरायला जाण्यासाठी निघतांना बसमध्येच त्याने अलकाच्या वाढदिवसाची जाहीर घोषणा करून केसरीतर्फे एक अभिनंदनपर पत्र व चॉकलेटची भेट तिला दिली आणि सगळ्यांना एक्लेअर्स वाटले.

त्या दिवशी आम्ही ट्रेव्ही फाउंटनच्या ज्या भागात फिरलो त्या भागात आम्हाला कुठेच बेकरी किंवा डिपार्टमेंटल स्टोअर दिसले नाही. त्यामुळे साधा केकसुद्धा मिळाला नाही. टाईम एलेव्हेटर राईड घेऊन रात्रीच्या जेवणासाठी ज्या भारतीय रेस्टॉरेंटमध्ये गेलो तिथे तर एखाद्या आडगांवातल्या खानावळीत असाव्यात तशा दोन तीन छोट्या छोट्या खोल्यांमध्ये टेबल खुर्च्या मांडून बसण्याची जेमतेम सोय केली होती आणि चार ठरावीक खाद्यपदार्थांचे जेवण होते. आयत्या वेळी केकच काय पण कुठलाच पदार्थ मागवण्याची मुळी सोयच त्या जागी नव्हती. अखेरीस बाहेर जाऊन सर्वांसाठी आईसक्रीम आणले आणि आमच्यातर्फे ते वाटून आम्ही वाढदिवस साजरा केला.
रोमला आल्यानंतर पुढील प्रवासासाठी जी बस मिळाली होती ती आपल्याला परिचित असलेल्या व्हॉल्व्हो आरामगाड्यांहून भारी होती तसेच वेगळी होती. एक तर युरोपमधील वाहतूक नियमांनुसार तिचा चालक डाव्या बाजूला बसायचा आणि प्रवाशांसाठी ठेवलेली दोन्ही दारे उजव्या बाजूला होती. सामानासाठी असलेले कप्पे खालच्या बाजूला असल्यामुळे बसण्याच्या सीट्स खूपच उंच होत्या व त्यामुळे चांगल्या चार पांच पाय-या चढून आंत जावे लागे. चालकाच्या हांताशी असलेली बटने दाबून तो सर्व दरवाजे उघडत किंवा मिटत असे. त्या देशात ड्रायव्हरला सन्माननीय वागणूक देणे आवश्यक आहे आणि गाडी चालवण्याव्यतिरिक्त इतर कोठलेही तो काम करणार नाही व कुणी त्याला कांही सांगायचे नाही हे त्याची कॅप्टन म्हणून ओळख करून देतांनाच संदीपने स्पष्ट केले होते. तरीही कधी कधी सामान चढवण्या व उतरवून घेण्यासाठी आपण होऊन तो आम्हाला मदत करीत होता.
त्याच्या शेजारीच संदीपच्य़ा बसण्याची जागा होती आणि त्याच्याकडे एक ध्वनिक्षेपक होता. त्याचा उपयोग करून तो रोज सगळ्या सूचना देत असे. बस हीच आमची कॉन्फरन्स रूम होती व पुढील प्रवासात त्याचा चांगला उपयोग करून घेतला. एक व्हीडिओ मॉनिटरसुद्धा होता, पण त्याचा कधीच उपयोग केला गेला नाही. कदाचित त्यासाठी जी इतर उपकरणे लागतात ती उपलब्ध झाली नसावीत. बसमध्ये खाली गालिचा अंथरलेला होता व तो स्वच्छ करण्यासाठी व्हॅक्यूम क्लीनिंग करणे एवढाच एक उपाय होता. ती बस रोजच्या रोज स्वच्छ करण्याची कांहीच योजना नव्हती. बसमध्ये प्रवाशांनी कसलाही कचरा टाकू नये, विशेषतः ओले खाद्यपदार्थ खाली गालिचावर पडता कामा नयेत याची खबरदारी आम्ही घ्यायची होती.
बसमध्ये एक संगणक होता व संपूर्ण दौ-याचा कार्यक्रम त्यात एका सीडीद्वारे फीड केला जायचा. ड्रायव्हरने एका दिवसात बारा तासांपेक्षा अधिक काळ काम करायचे नाही, दर दोन तासानंतर सक्तीची पंधरा मिनिटे विश्रांती घ्यायची वगैरे वाहतूकीचे नियम पाळणे आवश्यक होते व बसचे इंजिन सुरू होणे व बंद होणे, ती किती किलोमीटर चालली वगैरे माहिती त्या संगणकात आपोआप जात असल्यामुळे तो संगणक एका प्रकारे नियंत्रणाचे काम करीत होता. कोठल्याही नियमाचे उल्लंघन होत आहे असे वाटल्यास तो तशी पूर्वसूचना देई व तरीही उल्लंघन झाल्यास इंजिन सुरू ठेवणे अशक्य होत असे म्हणे. या कडक नियमांमुळे आमचा प्रवास विशेष दगदग न करता आरामात होत असे हे खरे असले तरी त्यासाठी कधी लवकर उठण्याची किंवा भूक लागलेली नसतांना रात्रीचे जेवण आटोपून घेण्याची घाई करावी लागत असे ते त्रासदायक वाटत असे.
रोमला आलेल्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी अचानक आलेल्या पावसाने थोडासा आश्चर्याचा धक्का दिला. पण गंमत म्हणजे कुठून तरी एक बांगलादेशी विक्रेता छत्र्या घेऊन रस्त्यातच त्या जागी हजर झाला आणि ब-याच जणांनी त्याच्याकडून छत्र्या खरेदी केल्या. दुस-या दिवशी आम्ही त्या छत्र्या बरोबर घेतलेल्या होत्या, तरीही दिवसभर स्वच्छ ऊन पडलेले असल्यामुळे कधीच त्या हांतात घेऊन बसखाली उतरावेसे वाटले नाही. त्यामुळे शेवटी आम्ही नोव्होना पियाझाला गेलो तेंव्हासुद्धा त्या गाडीतच राहिल्या. खरे तर ती जागा दहा पंधरा मिनिटात सहज पाहण्यासारखी होती पण आमच्या वेळापत्रकानुसार त्या ठिकाणी तास सव्वा तास दिलेला होता. तो वेळ कसाबसा घालवून आम्ही परत जायला निघालो आणि एकदम गारांचा वर्षाव सुरू झाला. मुंबईला तर गारा फारच क्वचित पडतात, पण भारतातील इतर शहरातसुद्धा मी असा गारांचा सडा पडलेला यापूर्वी कधीही पाहिलेला नव्हता. बसपर्यंत पोचण्यासाठी पांच मिनिटे चालणेसुद्धा अशक्य झाल्यामुळे सर्वांनी रस्त्याच्या कडेला मिळेल तो आसरा घेतला आणि पावसाची सर थांबल्यानंतर ओल्याचिंब अवस्थेत गाडीत जाऊन बसलो.
कोलोजियम पहायला गेलो त्या जागी कांही लोक प्राचीन रोमनकालीन कपडे परिधान करून हिंडत होते व पर्यटक त्यांचे व त्यांच्याबरोबर स्वतःचे फोटो काढून घेत होते. पियाझा नोव्होनामध्ये तर चित्रविचित्र कपडे घालून कोणी पुतळ्यासारखा उभा होता तर कोणी चमत्कारिक अंगविक्षेप करीत होता. अर्थातच भीक मागण्याचेच हे विविध प्रकार होते. आपल्याकडच्या डोंबा-याने तिथे एकादा खेळ लावला असता तर तो नक्कीच चांगला चालला असता!

ग्रँड युरोप - भाग ५- रोमन साम्राज्याचे अवशेष


दि. १७-०४-२००७ दुसरा दिवस - रोमन साम्राज्याचे अवशेष


व्हॅटिकन सिटीच्या ख्रिश्चन विश्वाचे धांवते दर्शन घेतल्यानंतर तिच्यातून बाहेर पडून पुन्हा आम्ही सगळे रोम शहरात आलो. व्हॅटिकन सिटीच्या कोठल्याही दारातून बाहेर पडले की आपण सरळ रोम शहरातच प्रवेश करतो इतके ते त्याला खेटून किंवा वेढा घालून वसलेले आहे. आदल्या दिवशी ट्रेव्ही फाउंटन पाहून झाल्यावर टाईम एलेव्हेटर राईड घेतांना रोमच्या इतिहासकालीन घटनांचे चलचित्र पाहतांना तेथील कांही प्रमुख इमारतींचे पडद्यावर दर्शन मिळाले होते. आज त्या इमारती प्रत्यक्ष पहायला मिळाल्या.
दोन अडीच हजार वर्षापूर्वीच्या रोमन साम्राज्यकालीन वाडे, राजवाडे, सभागृहे, किल्ले, कोट, बुरुज, खंदक वगैरेंचे भग्नावशेष, ब-यापैकी परिस्थितीत असलेले मध्ययुगीन सुवर्णकाळात बांधलेले वाडे, चर्चेस व उभारलेल्या कमानी, स्तंभ आणि आजच्या काळातील मोठमोठी कांचेची तावदाने असलेल्या आधुनिक इमारती यांचे एक विलक्षण मिश्रण या शहरात पहायला मिळते. एकमेकांच्या बाजूबाजूला तर त्या सर्रास दिसतात, पण कधीकधी इतिहासाच्या खांद्यावर वर्तमान उभे असलेले दृष्य पहायला मिळते.
येथील लोकांची राहती घरे बहुतेक करून तीन चार मजल्यांची दिसली. प्रत्येक घराला प्रशस्त बाल्कन्या आहेत आणि जवळ जवळ प्रत्येक बाल्कनीमध्ये फुलझाडांनी बहरलेल्या कुंड्या मांडून ठेवलेल्या दिसतात. कांही थोड्या ठिकाणी तर भिंतींवर जागोजागी हुक्स लावून त्यावर वेली चढवलेल्या दिसल्या. या मौसमांमध्ये आलेल्या नवपल्लवींनी त्यांनी भिंती पार झाकून टाकल्या होत्या, तसेच रंगीबेरंगी फुलांचा बहर आलेला असल्याने त्या फारच मनोहर दिसत होत्या. आमच्या ग्रुपमधील कांही वृक्षप्रेमी लोकांना तर येथून फुलझाडांची रोपे नेण्याची अनावर इच्छा होत होती, पण प्रवासात ती कशी सांभाळायची आणि विमानांतून ती नेता येतील कां हे प्रश्न पडल्यामुळे अखेरीस त्यांनी त्या झाडांची बी बियाणेच घेऊन जाण्याचा मार्ग पत्करला.
व्हॅटिकन सिटीमधून बाहेर पडल्यावर पियाझा व्हेनिझाजवळ व्हिट्टोरिय़ो स्मारक दिसले. प्राचीन ग्रीक व लॅटिन शिल्पकला आणि आधुनिक वास्तुशिल्पशास्त्र यांचा सुरेख मिलाफ या जागी पहायला मिळतो. प्राचीन मूर्तीकला व आधुनिक स्थापत्यशास्त्र यांचा संयोग करून आपल्याकडे अनेक नवी मंदिरे बांधण्यात आली आहेत. दिल्ली येथील स्वामीनारायण मंदिर किंवा पुण्याजवळ केतकावली येथील प्रति तिरुपती देवस्थान ही अलीकडची उदाहरणे सांगता येतील. रोम येथील व्हिट्टोरियो स्मारकामध्ये गेल्या शतकातल्या वास्तुशिल्पशास्त्रावर आधारलेली एक भव्य इमारत आहे, पण अनेक उत्तमोत्तम मूर्तींचा उपयोग करून ती सुबकपणे सजवलेली आहे. समोरच एका उंच चबूत-यावर एका अश्वारूढ वीराचा एक देखणा पुतळा आहे. अनेक राज्यांमध्ये विभागल्या गेलेल्या प्रदेशांचे एकत्रीकरण करून आजचा इटली देश निर्माण करणा-या व्हिट्टोरियो या पहिल्या राजाच्या स्मरणार्थ हे स्मारक उभे केले गेले. तसेच पहिल्या महायुद्दात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांचेसुद्धा हे स्मारक आहे.
टायबर नदीच्या किना-यावरील सात टेकड्यांवर रोम हे शहर वसलेले आहे. नदीच्या किना-यावरच प्राचीन काळातील रोमचे अनेक भग्नावशेष विखुरलेले पहायला मिळतात. अगदी रोम्युलसने नगरीची सुरुवात कुठून केली तिथपासून वेगवेगळ्या सम्राटांनी कोणकोणच्या इमारती बांधल्या वगैरेचे सुरस वर्णन आमचा गाईड करीत होता. माझे इतिहासविषयक ज्ञान कधीच इतिहासजमा झालेले असल्यामुळे मधेच कुठेतरी सीजर, ऑगस्टस असे ओळखीचे शब्द कानावर पडल्यासारखे वाटायचे. इतर राजा रजवाड्यांबद्दल कांडीचेही आकर्षण नसल्यामुळे कोणी बांधले यापेक्षा काय बांधले होते इकडेच मी थोडे लक्ष देऊन ऐकत होतो.
एक तर स्वसंरक्षणार्थ बांधलेली तटबंदी, खंदक वगैरे व वाड्यांचे अवशेष दिसत होते. "खंडहर बताते हैं कि इमारत कितनी बुलंद थी।" या वाक्याचा अर्थ इथे चांगला लक्षात येतो. कांही जागी पडक्या भिंती, कांही ठिकाणी छपराशिवाय नुसतेच खांब उभे असलेले तर कांही जागी फक्त जमीनीखालच्या पायाची रचना एवढीच साक्ष आता उरली आहे. एका ठिकाणी एक इजिप्शियन पद्धतीचे पिरॅमिडसुद्धा आहे. कांही जागी पूर्वीच्या काळातील पाणीपुरवठा करपणारे अक्वेडक्ट आहेत. हे सर्व अवशेष व्यवस्थितपणे जतन करून ठेवले आहेत, तसेच त्याचा इतिहास नोंदवून ठेवला आहे. ते पाहून तत्कालिन वास्तुशास्त्र, बांधकामात उपयोगात आणलेले दगड, माती, विटा आदि सामान, त्या काळांतल्या समाजाची राहणी, त्यांचे अन्न, त्यांची करमणुकीची साधने अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करणारी मंडळी इथे मुक्काम ठोकून बसतात व त्यांना भरपूर माहिती मिळते.
कोलोजियम हे पूर्वीच्या रोमन लोकांचा पराक्रम, तत्कालिन स्थापत्यशास्त्र याचप्रमाणे त्यांचा अमानुष क्रूरपणा दाखवणारे सर्वाधिक प्रसिद्ध, भव्य व उत्तम उदाहरण म्हणता येईल. आठ दरवाज्यामधून प्रत्येकी दहा हजार प्रेक्षकांना आत जाऊन बसता येईल इतके मोठे हे वर्तुळाकार स्टेडियम दोन हजार वर्षापूर्वी बांधले गेले. भरभक्कम उंच भिंती व आंतील भागात बनवलेले भूगर्भाखालील रस्त्यांचे जाळे यांवरून त्याच्या बांधकामातील कौशल्य दिसून येते. त्याच्या भिंतींवर दोन्ही बाजूंनी संगमरवराच्या फरशा बसवल्या होत्या असे म्हणतात. या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी इथे ग्लॅडिएटर्सच्या ख-याखु-या लढाया खेळल्या जात असत. गुन्हेगार, गुलाम व राजाची गैरमर्जी झालेले लोक यांना ग्लॅडिएटर बनण्यासाठी तालिमीत तयार करून इथे मृत्यूच्या दाढेत ढकलून देत असत व कोण कोणाला कसे मारतो हे प्रेक्षकगण चवीने पहात असत. एका युद्धात प्रतिस्पर्ध्याला ठार मारून मिळवलेला विजय अल्पकालच टिकत असे कारण लगेच त्या विजयी वीराला दुस-या योध्द्याशी मुकाबला करवा लागत असे. कधीकधी तर भुकेलेले वाघसिंहादि हिंस्र पशूं त्यांच्या अंगावर सोडले जात व त्यांनी केलेली चिरफाड पहातांना आणि माणसांच्या करुण किंकाळ्या ऐकतांना प्रेक्षक टाळ्या वाजवीत असत. रोमन साम्राज्याच्या -हासाबरोबरच हा रानटीपणा बंद झाला व कोलोजियम ओस पडले. त्यानंतरच्या काळात लोकांनी तेथील दगड काढून नेण्यास सुरुवात केली. रोममधील अनेक सुंदर इमारती बनवतांना कोलोजियममधून आणलेले संगमरवराच्या दगडांचा त्यात उपयोग केला गेला असे म्हणतात.
कोलोजियम पाहून झाल्यावर आम्ही पियाझा नोव्होना या ठिकाणी गेलो. पूर्वीच्या काळी इथे रथांच्या शर्यती वगैरे होत असत म्हणे. त्याचा मूळचा ओव्हल आकार अद्याप टिकवून ठेवलेला आहे. मधे कांही कारंजे व सुंदर मूर्ती आहेत. एका जागी त्या काळात माहीत असलेल्या चार प्रमुख नद्यांचे प्रतिनिधित्व करणारे पुतळे आहेत, त्यात एक आपली गंगा नदीसुद्धा आहे. इजिप्तमधून आणलेला एक कोरीव काम केलेला उभा चौकोनी उंच दगडी खांब आहे, त्याला ओबेलिस्क म्हणतात. हे एवढे अवजड धूड इजिप्तमधून अथपर्यंत कसे वाैहून आणले असेल ते देव जाणे. एका ठिकाणी लुशोभीकरण सुरू असल्यामुळे तेथील शिल्पे प्लॅस्टिकमध्ये झांकून ठेवलेली दिसली. सर्व बाजूने सुंदर इमारती आहेत. त्यात एक प्रसिद्ध चर्चसुद्धा आहे, तसेच हॉटेले, दुकाने आणि राहण्याची घरेदेखील आहेत.

Tuesday, April 21, 2009

ग्रँड युरोप - भाग ४ - व्हॅटिकन सिटी


दि। १७-०४-२००७ दुसरा दिवस - व्हॅटिकन सिटी

मागच्या भागात उल्लेख केल्याप्रमाणे पोपच्या धर्मसत्तेचा मान राखण्यासाठी त्याचे निवासस्थान असलेली 'व्हॅटिकन सिटी' हे एक स्वतंत्र राष्ट्र बनवण्यात आले. फक्त एकशे नऊ एकर म्हणजे अर्धा वर्ग किलोमीटरपेक्षाही लहान आकाराचे क्षेत्रफळ असलेले हे जगातील सर्वात लहान राष्ट्र आहे व त्याची लोकसंख्या एक हजाराच्याही आंत आहे. आपल्या सर्वसामान्य खेड्यापेक्षासुद्धा लहान जागा आणि कमी लोकवस्ती असलेला हा देश! पण कोठल्याही महानगरात मिळतील अशा सर्व सुखसोयी मात्र तिथे उपलब्ध आहेत बरे. पोप आणि त्याचे निकटवर्गीय धर्मगुरू यांचाच बहुधा या लोकसंख्येत समावेश होत असावा. कारण तिथली व्यवस्था पाहण्यासाठीच मुळी तीन हजारावर कर्मचारी काम करतात. बहुधा बाजूच्याच रोममधून ते रोज तेथे जातात. यापेक्षाही कित्येक पटीने जास्त पर्यटक तिथे रोज भेट देण्यासाठी येत असतील! त्यांची सेवा सुविधा वगैरेसाठी आणखी लोक तेथे येत असणार.
व्हॅटिकन पाहण्यासाठी आम्ही सकाळी थोडे लवकरच उठून निघालो होतो, तरीही त्या दिशेला जाणारे रस्ते वाहनांनी तुडुंब भरलेले असल्याकारणाने सव्वा दीड तासानंतर तेथे पोचलो, तोपर्यंत भरपूर गर्दी झालेली होती. व्हॅटिकनच्या संरक्षणासाठी पूर्वीच्या काळी बांधलेली उंच भिंत अजून शाबूत आहे. तिच्या बाहेरच्या बाजूलाच असलेल्या एका प्रचंड भूमीगत पार्किंग लॉटमध्ये बस उभी करून बाहेर निघालो. जमीनीखाली असलेल्या त्या अवाढव्य तळघरात पूर्वीच्या काळच्या इमारतींसाठी त्या काळी घातलेल्या पायाच्या मजबूत दगडी भिंती मध्ये मध्ये दिसत होत्या. त्या पायाच्या आधारावरच आज त्या ठिकाणी जमीनीच्या वर दिसत असलेल्या इमारती उभ्या आहेत. जमीनीखाली प्राचीन किंवा मध्ययुगातील पाया व त्यावर शेकडो वर्षानंतर बांधलेल्या इमारती असे जुन्या नव्याचे मिश्रण रोममध्ये सर्रास पहायला मिळते.
स्वतंत्रपणे येणा-या पर्यटकांसाठी लांबलचक रांग लागलेली होती, पण पर्यटकांच्या समूहांसाठी वेगळा दरवाजा होता. त्यामधून लगेच प्रवेश मिळाला. तिथेच आमचा स्थानिक मार्गदर्शक भेटला. या जागी एकाच वेळी अनेक ग्रुप येत असल्यामुळे प्रत्येक गाईड वेगवेगळ्या प्रकारचा झेंडा हातांत घेऊन हिंडत होता. त्या झेंड्याकडे पाहून आपला गाईड कुणीकडे चालला आहे हे समजत असे. त्या ग्रुपमधील प्रत्येकाला एक हेडफोन दिला जाई व गाईडकडे एक मायक्रोफोन असे. त्यातून वायरलेस संदेशवहनामधून त्याचे बोलणे सर्वांना ऐकू जात असे. अशा प्रकारे त्या प्रचंड गर्दी व गोंगाटामधून आपला मार्ग न चुकता सर्वांबरोबर हिंडणे व शक्य तितकी माहिती ऐकून व समजून घेणे शक्य झाले.
गेल्या अनेक शतकांपासून या ठिकाणी मोठमोठ्या चॅपेल्स, चर्चेस वगैरेंचे बांधकाम चालले होते. मध्ययुगात जेंव्हा धर्मगुरू हेच सर्वेसर्वा झाले तेंव्हा तर त्यांना राजवाड्यांचेच स्वरूप आले होते. मात्र ती धार्मिक श्रद्धास्थाने असल्यामुळे कोठल्याही लढायांमध्ये त्यांची विशेष हानी करण्यात आली नाही. नैसर्गिक आपत्तींमध्येच जी कांही पडझड होत गेली तिची डागडुजी तत्परतेने केली गेली. या कारणाने अत्यंत भव्य अशा ऐतिहासिक इमारती आजही येथे चांगल्या स्थितीमध्ये पहायला मिळतात. कलाकारांच्या पिढ्यान पिढ्या शतकानुशतके या इमारतींच्या सुशोभिकरणाच्या कामाला लागलेल्या होत्या. त्यांनी अनेक प्रकारे त्यांच्या सौंदर्यात भर घातली आहे.
यांत संगमरवराच्या व इतर प्रकारच्या दगडातून कोरलेल्या असंख्य मूर्ती आहेत, तसेच कलाकुसर केलेले खांब, कमानी, कोनाडे वगैरेंची लयलूट आहे. भिंतीवर रंगवलेली भव्य फ्रेस्कोज आहेत. ती बनवतांना भिंतीवरील गिलावा ओला असतांनाच ब्रशाने त्यावर चित्रे रंगवली जातात. त्यामुळे दोन्ही एकजीव होऊन एकमेकाबरोबरच सुकतात. अशी फ्रेस्कोज वक्राकृती सीलिंग्जच्या किंवा घुमटांच्या आंतल्या बाजूने सुद्धा काढलेली आहेत. ती रंगवण्यासाठी त्या कलाकारांनी इतक्या उंचावरील मचाणावर चढून व आडवे झोपून कसे काम केले असेल व त्यातून इतक्या सुंदर कलाकृती कशा निर्माण केल्या असतील या विचाराने मन थक्क होते. सर्वसामान्य कलाकारच नव्हेत तर मीकेलँजिलोसारख्या तत्कालिन सर्वोत्तम कलावंतांनी देखील अशा प्रकारे काम या ठिकाणी वर्षानुवर्षे केलेले आहे. जमीनीवर तर अगणित प्रकारांनी रंगीबेरंगी फरशा बसवून त्यातून तरत-हेच्या आकृती निर्माण केल्या आहेतच, छोट्या छोट्या रंगीबेरंगी दगडांच्या मोझेकमधून भिंतीवर देखील सुंदर चित्रे बनवली आहेत. टॅपेस्ट्री नांवाच्या आणखी एका प्रकारात प्रचंड आकाराचे गालिचे विणतांनाच त्यामधील धाग्यांना योग्य प्रकारचे रंग देऊन त्यातून सुंदर चित्रे निर्माण केलेली आहेत व ते गालिचे उभे करून भिंतींवर चिकटवले आहेत. बहुतेक खिडक्यांच्या कांचेच्या तावदानांवर सुंदर आकृती रंगवलेल्या आहेत. त्यासाठी आधी कांच बनवतांना ती वितळलेल्या स्थितीत
असतांनाच त्यात रंग मिसळले जातात व त्यावर विशिष्ट रंगांनी चित्र काढून ती कांच भट्टीमध्ये भरपूर भाजली जाते.
कांही चित्रांतील चेहेरे अशा खुबीने बनवले आहेत की त्यांच्याकडे पहात या टोकांपासून त्या टोकापर्यंत दहा बारा पावले चालत जातांना ती व्यक्ती सतत आपल्याकडे टक लावून पहात असल्याचा भास होतो किंवा पन्नास माणसांचा घोळका ते चित्र पहात असतांना त्यातील प्रत्येकाला ते आपल्याकडे पाहते आहे असे वाटते. एका जागी तर सपाट छपरावर एक चित्र रंगवून त्यावरील छायाप्रकाशाच्या खेळाने त्या जागी त्रिमितीमध्ये रेखीव कलाकुसर कोरली असल्यासारखे दिसत होते. महाभारतातील मयसभेबद्दल फक्त ऐकले किंवा वाचले होते. इथे आल्यावर अशा प्रकारची दिशाभूल प्रत्यक्ष पहायला मिळाली. याशिवाय तत्कालिन युरोप खंडातील व इजिप्तसारख्या देशातून जिंकून आणलेले कलाकृतींचे कित्येक नमूने जागोजागी मांडून ठेवले आहेत. आज ही सगळी चर्चेस उत्कृष्ट वस्तुसंग्रहालये झाली आहेत.
व्हॅटिकनमध्ये अशा प्रकारची चार स्वतंत्र म्यूजियम्स आहेत. वेळे अभावी आम्हाला त्यातील सिस्टीन चॅपेल ही जगप्रसिद्ध इमारत व सेंट पीटर्स बॅसिलिका हे जगातील सर्वात मोठे चर्च एवढेच आंतून पहायला मिळाले. पंधराव्या व सोळाव्या शतकातील युरोपमधील सर्वोत्तम कलाकारांच्या चित्रकला व शिल्पकला यांनी सिस्टीन चॅपेल सजले आहे. सिक्स्टस नांवाच्या पोपने चौदाव्या शतकात याचे उद्घाटन केले म्हणून त्याचे नांवावरून सिस्टीन हे नांव पडले. मीकेलँजिलोने या चॅपेलच्या छपरावर आंतल्या बाजूला रंगवलेली 'दि क्रीएशन' व 'दि लास्ट जजमेंट' ही अनुक्रमे मानवजातीची परमेश्वराद्वारे करण्यात आलेली उत्पत्ती आणि शेवटी त्यांची स्वर्गात वा नरकात रवानगी दाखवणारी चित्रे जगप्रसिद्ध आहेत. ईव्हची उत्पत्ती, ईडन बाग, निषिद्ध असलेले फळ खाणे वगैरे दाखवणारी याच मालिकेतील आणखी कांही चित्रेही आहेत. गेल्या शेकडो वर्षांत धुरामुळे या चित्रांवर साठलेला कार्बनच्या कणांचा थर हलकेच काढून कांही वर्षांपूर्वीच त्यांना पुन्हा एकदा पूर्वीचा तजेला प्राप्त करून दिला आहे. हे काम सुद्धा कित्येक वर्षे चालले होते म्हणे. त्यामुळे आम्हाला मात्र ती चित्रे स्वच्छ व चांगल्या स्वरूपात पहायला मिळाली. बायबलमधील ओल्ड व न्यू टेस्टामेंटमध्ये वर्णिलेले अनेक प्रसंग दाखवणारी भव्य चित्रे जिकडे तिकडे आहेत. ग्रीक व लॅटिन पुराणांतील वेगवेगळ्या देवता, राजे, महापुरुष तसेच खलनायक वगैरेंच्या चित्रांची व पुतळ्यांची गणतीच करता येणार नाही.
सेंट पीटर्स बॅसिलिका हे जगातील सर्वात मोठे चर्च हे एक स्थापत्यशास्त्राचे अद्भुत आश्चर्य मानावे लागेल. त्याच्या भिंतीच पंचेचाळीस मीटर उंच उभ्या आहेत आणि मधला घुमट तर तब्बल एकशे छत्तीस मीटर उंच आहे. क्रेन किंवा लिफ्टसारखी कोठलीही यांत्रिक साधने नसतांना माणसांनी आपल्या ताकतीने व हिंमतीने इतक्या उंचीवर दगडविटा नेऊन हे बांधकाम कसे केले असेल? ते काम सुरू असतांना अर्धवट बांधलेल्या भागाला खालून आधार कसा दिला असेल? आपल्याकडल्या ताजमहाल व गोलघुमटाबद्दल सुद्धा असेच कौतुक वाटते. या ठिकाणी भव्य असा घुमट तर आहेच पण त्यावर सुरेख चित्रे देखील रंगवली आहेत. त्याच्या भिंतींच्या बाह्य कठड्यावर वेगवेगळ्या ख्रिश्चन साधूसंतांच्या पूर्णाकृती पुतळ्यांची रांगच उभी केली आहे. आंत जाण्यासाठी समोरील मुख्य दरवाजाच्या बाजूलाच उपद्वारे आहेत. त्यातील एक दरवाजा फक्त अतिविशिष्ट अतिथींसाठी राखून ठेवलेला आहे तर एका दरवाजातून आंत प्रवेश केल्यास सर्व पापांचा नाश होऊन ती व्यक्ती नक्की स्वर्गाला जाते अशी भाविकांची समजूत आहे. मात्र हा दरवाजा बंद करून व त्याची किल्ली त्याच दाराच्या आड ठेऊन त्याच्या मागच्या बाजूला एक भिंती बांधून ठेवली आहे. पंचवीस वर्षातून एकदा ही भिंत फोडून ती चावी बाहेर काढली जाते व प्रत्यक्ष पोपमहाराज त्या किल्लीने तो दरवाजा उघडून आंत प्रवेश करतात. अर्थातच त्या वेळी त्यांच्या मागोमाग जाऊ
इच्छिणा-या लोकांची भाऊगर्दी नक्की उडत असणार. प्रवेशद्वारातून आंत गेल्यावर किती तरी प्रशस्त व उंच दालने आहेत. तिकडे जाण्यासाठी मोठमोठे पॅसेजेस आहेत. त्यात जागोजागी चित्रे व पुतळे यांची रेलचेल आहे.
मीकेलँजेलो याचे पिएटा हे सुप्रसिद्ध शिल्पही येथेच आहे. तळघरांमध्ये पूर्वी होऊन गेलेल्या अनेक पोपांची दफनभूमी आहे, तर कांही विशिष्ट संतांची शरीरे जतन करून ठेवलेली आहेत. त्यांचे दर्शन घेणा-यांचीही गर्दी असते. घुमटावर चढून जाण्यासाठी सोय आहे पण तिकडे जाण्यासाठी इच्छुक लोकांनी लावलेली रांगच नजर पोचेल तिथपर्यंत लागलेली होती. अर्थातच आमच्याकडे इतका वेळ नव्हता.
सेंट पीटर्स बॅसिलिका पाहून झाल्यावर सेंट पीटर्स पियाझामध्ये बाहेर आलो. पियाझा म्हणजे चौक. हा चौक तर एखाद्या पटांगणासारखा अवाढव्य आहे. सेंट पीटर्स बॅसिलिकाच्या दोन्ही अंगाने पसरलेले खांबावर उभे असलेले लांब रुंद व उंच असे प्रशस्त आडोसे पाहून ती वास्तू दोन्ही हांत पसरून आपल्याला आवाहन करीत असल्याचा भास होतो. येथील सर्व वास्तुशिल्प मुख्यतः बेनिनी या सुप्रसिद्ध इटालियन वास्तुशिल्पकाराच्या अचाट कल्पनाशक्तीतून निर्माण झाले आहे. त्याने सुरू केलेली बरोक ही शैली पुढे युरौपभर आणि तेथून जगभर पसरली व उंच कमानी, भव्य दरवाजे, भरपूर कलाकुसर वगैरे वैशिष्ट्याने नटलेल्या अनेक भव्य वास्तू त्या शैलीमध्ये बनवल्या गेल्या.
पोपचे वसतीस्थान इथे उभे राहून दिसते. दर आठवड्यात ठरलेल्या वेळी आपल्या खिडकीत उभे राहून पोप महाराज दर्शन देतात व हांत हलवून अभिवादन करतात. ते पाहण्यासाठी खूप गर्दी होते. तसेच वर्षातील ठरलेल्या उत्सवांच्या दिवशी ते धार्मिक प्रवचन देतात. ते इथे येऊन ऐकण्यासाठी निमंत्रणाची आवश्यकता असते.
व्हॅटिकन सिटीमधून बाहेर येतांना कांही तरी अचाट, भव्य, दिव्य असे पाहिल्याचा अनुभव येतो व ख्रिश्चन धर्माबद्दल मनात यत्किंचित प्रेमभावना नसलेल्यांनासुद्धा "तेथे कर माझे जुळती" असे म्हणावेसे वाटते.

Saturday, April 18, 2009

ग्रँड युरोप - भाग ३ - रोममध्ये भ्रमण


दि. १६-०४-२००७ पहिला दिवस - रोममध्ये भ्रमण


प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन कालखंडांतील इतिहासाच्या खुणा दाखवणारे अवशेष बहुतेक करून वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात. दिल्लीसारख्या क्वचितच एखाद्या जागी या तीन्ही प्रकारचे अवशेष सापडतात. पण गेल्या दोन हजाराहून अधिक काळातल्या सलग अशा इतिहासकाळाचे दर्शन घडवणा-या भव्य इमारतींचे भग्नावशेष तसेच सुस्थितीमध्ये ठेवलेल्या ऐतिहासिक वास्तू एवढ्या मोठ्या प्रमाणात एका जागी रोमखेरीज अन्य कोठे दिसणार नाहीत. केवळ राजकीय घटनाक्रमाचा इतिहासच नव्हे तर कला व संस्कृती यांचा इतिहाससुद्धा दाखवणारा अत्यंत समृद्ध असा खजिना या ठिकाणी जतन करून ठेवलेला आहे.
रोम शहराच्या स्थापनेसंबंधी एक दंतकथा प्रचलित आहे. त्या कथेप्रमाणे एका अविवाहित राजकन्येच्या पोटी जन्मलेल्या रोम्युलस आणि रेमस नांवाच्या जुळ्या भावंडांना तान्ही बाळे असतांनाच नदीकांठी सोडून दिले गेले होते. परंतु हिंस्र पशूंच्या भक्ष्यस्थानी पडण्याऐवजी एका लांडगीनेच स्वतःचे दूध पाजून त्यांना वाढवले. तरुण झाल्यावर ते मोठे शूरवीर बनले आणि त्यांनी आजूबाजूच्या भागात आपला अंमल सुरू केला. पुढे दोन्ही भावाभावातच लढाई होऊन त्यात रोम्युलसने रेमसला मारून टाकले व तो तेथील राजा झाला. त्याने एका डोंगरावरील उजाड जागी रोम या आपल्या राज्याच्यी नवी राजधानी वसवली. अशी रोमच्या जन्माची गोष्ट सांगतात. ही घटना ख्रिस्तपूर्व आठव्या शतकात घडली.
त्यानंतर रोम शहराची तसेच त्या राज्याची भरभराट होत गेली. कालांतराने तिथे राजेशाहीच्या ऐवजी प्रजातंत्राची स्थापना झाली व लोकप्रतिनिधींच्या एकत्र विचारानुसार राज्यकारभार सुरू झाला. ज्युलियस सीजर या महापराक्रमी व महत्वाकांक्षी माणसाने रोमन प्रजातंत्राच्या राज्याचा चहूकडे विस्तार केला पण त्याची सर्व सत्तासूत्रे स्वतःच्या एकट्याच्या हांतात घेतली. यामुळे नाराज झालेल्या त्याच्या विश्वासू सहका-यांनीच कट करून त्याची हत्या केली. या प्रसंगातील नाट्य शेक्सपीयरच्या ज्युलियस सीजर या नाटकाने अजरामर केले आहे. त्यातील ज्यूलियसच्या तोंडी असलेले "ब्रूटस तू सुद्धा! मग आता सीजरला मरायलाच पाहिजे." हे अतीव वैफल्य दाखवणारे उद्गार, तसेच मार्क अँथनीच्या भाषणातील "आणि ब्रूटस हे एक सन्मान्य गृहस्थ आहेत." हे पुन्हा पुन्हा येणारे उपरोधिक वाक्य यांचा उल्लेख ब-याच वेळा नमून्यादाखल केला जातो. ज्यूलियस सीजरची हत्या झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रजातंत्र कांही प्रस्थापित होऊ शकले नाही. मागाहून आलेल्या सीजर्सनी, विशेषतः ऑगस्टसने आपला साम्राज्यविस्तार चालूच ठेवला व रोमन साम्राज्य हे एक शक्तीशाली साम्राज्य म्हणून उदयास आले.
सुरुवातीस रोमन सम्राटांनी ख्रिश्चन धर्माला कडाडून विरोध केला, एवढेच नव्हे तर त्याच्या प्रसारकांना हाल हाल करून ठार मारले. तरीसुद्धा हळू हळू जनतेमध्ये तो अधिकाधिक लोकप्रिय होत गेला व सरतेशेवटी रोमन सम्राटानेसुद्धा त्या धर्माचा स्वीकार करून त्याला राजाश्रय दिला. त्यानंतरच्या काळात राजाची सत्ता क्षीण होत गेली व धर्मगुरूंचे प्राबल्य वाढत गेले. मध्यंतरीच्या कालखंडात तर पोप व त्याचे गांवोगांवचे प्रतिनिधी हेच सर्वसत्ताधारी बनून बसले होते. ठिकठिकाणी एखाद्या डोंगराच्या शिखरावर किल्ल्यासारखी तटबंदी बांधून बांधलेली त्यांची आलीशान निवासस्थाने आजसुद्धा पहायला मिळतात.
या काळात युरोपांत सर्वत्र व विशेषतः इटलीमध्ये अत्यंत भव्य अशी चर्चेस, चॅपेल्स, कॅथेड्रल्स वगैरे बांधण्यात आली. त्यामधील कांही वास्तू तर एवढ्या प्रचंड आहेत की त्याचे बांधकाम दोन तीनशे वर्षे चालले होते. तसेच देशोदेशीच्या महान कलाकारांनी पिढ्यान पिढ्या राबून त्या सजवल्या आहेत. यांत दगडातून कोरलेल्या असंख्य मूर्ती, कलाकुसर केलेले खांब, कमानी, कोनाडे, भिंतीवर रंगवलेली भव्य फ्रेस्कोज, गालिचे, हंड्या, झुंबरे वगैरे असंख्य वस्तू आहेत.
आधुनिक काळात पोपची राजकीय सत्ता पुन्हा संकुचित झाली व देशोदेशीची साम्राज्ये युरोपात उभी राहिली. एवढेच नव्हे तर त्यांनी जगभर आपापली साम्राज्ये पसरवली. रोम ही तर इटली या देशाची राजधानी बनली. पण पोपच्या धर्मसत्तेचा मान राखण्यासाठी त्याचे निवासस्थान असलेली व्हॅटिकन सिटी हे एक स्वतंत्र राज्य बनवण्यात आले. रोम आणि व्हॅटिकन सिटी मधील सर्व अवशेष आणि कलाकृती व्यवस्थितपणे पाहण्यासाठी एक जन्म पुरेसा नाही असे म्हणतात. रोममधल्या आमच्या दोन दिवसांच्या मुक्कामामधला पाऊण दिवस तर निवासस्य़ानी पोचण्यात गेला होता. त्यामुळे आम्हाला जितके जमेल तितके रोम उरलेल्या जेमतेम सव्वा दिवसात पाहून घ्यायचे होते.
युरोपमध्ये व विशेषतः रोममध्ये वाहतुकीचे नियम जरा कडक आहेत. तरीही सगळीकडे ट्राफिक जाम झालेला असतो ही गोष्ट वेगळी. आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी बस नेता येत नाही की उभी करून ठेवता येत नाही. त्यामुळे मोठ्या रस्त्यावरील एका जागी आम्ही खाली उतरलो व संदीपच्या मागोमाग गल्ल्याबोळांतून चालत चालत ट्रेव्ही फाउंटन या जगप्रसिद्ध जागी आलो. या ठिकाणी नांवाप्रमाणे वाटतो तसा भव्य असा कारंजा नाही. पण छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे अत्यंत सुंदर अशा अनेक शिल्पांनी नटलेली एक मोठी इमारत आहे व त्या शिल्पांच्या मधूनच पाण्याचे अनेक प्रवाह खळाळत खालच्या कुंडात पडतात. त्यात फूट दीड फूट उंचीचे कांही फवारेही आहेत. एका मोठ्या चौकामध्ये ही प्रेक्षणीय कलाकृती तयार केली आहे. तीनशे वर्षापूर्वी ती बनवतांना जमीनीखालून तिथे वाहते पाणी आणण्याची अद्भुत व्यवस्था केली होती. आजकाल ते सतत वाहणारे पाणी कुठून येते व कुठे जाते ते समजत नाही. आजूबाजूला तरी कुठे पंपाचा आवाज ऐकू आला नाही. या कुंडामध्ये श्रद्धापूर्वक एखादे नाणे फेकले तर तो माणूस पुन्हा कधी ना कधी त्या ठिकाणी परत येतो अशी समजूत आहे. त्यावर इथे युरोच पाहिजे, चवली पावली चालणार नाही अशी मल्लीनाथी कोणीतरी केली. हे ठिकाण पहायला येणा-या पर्यटकांची ही झुंबड उडालेली होती. त्यात आंतरराष्ट्रीय पाकीटमार आणि खिसेकापूसुद्धा असण्याची शक्यता असते, त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात असा इशारा संदीपने आधीच देऊन ठेवला होता.
युरोपमधल्या बेभरंवशाच्या वातावरणाचा पहिला अनुभव इथे आला. आम्ही त्या ठिकाणी पोचलो तेंव्हा तेथे किती लख्ख ऊन पडले होते हे या छायाचित्रांवरूनही दिसते. पण पाहता पाहता आभाळ अंधारून आले आणि पावसाचे थेंब पडायला सुरुवात झाली. सुदैवाने त्याचा जोर वाढला नाही आणि आम्ही चालक चालत आमच्या पुढील कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचू शकलो.
आमचा पुढील कार्यक्रम होता टाईम एलेव्हेटर राईड. हा एक अद्भुत प्रकारचा अनुभव आहे. आधी एका हॉलमध्ये उभ्या उभ्या रोमच्या इतिहासाची थोडक्यात माहिती ऐकून मुख्य सभागृहात गेलो. विमानात असतो तसा एक हेडफोन तिथे खुर्चीलाच जोडलेला असतो तो कानांना लावला की इटालियन किंवा इंग्रजी भाषेत समीक्षण व संवाद ऐकू येतात. त्या दृष्टीने त्या ठिकाणी इटालियन व इंग्रजी भाषिकांसाठी वेगवेगळे बसण्याचे विभाग आहेत. समोरील पडद्यावर रोमच्या इतिहासाचा चित्रपट दाखवला जात असतांनाच आपल्या खुर्च्या जागच्या जागी हलायला व थरथरायला लागतात, तसेच मागून, पुढून व सर्व बाजूने आवाज येऊ लागतात. समोरील चित्रे झूम शॉटने मागे पुढे होऊ लागतात. आपण त्रयस्थपणे पडद्यावरील दृष्य पहात नसून प्रत्यक्ष त्या घटनास्थळी हजर होतो असे वाटण्यात या सा-याचा परिणाम व्हावा असा उद्देश यामागे आहे. तो कांही प्रमाणात सफल होतो. केंव्हा केंव्हा मात्र विनाकारण आपल्याला जोरजोरात दचके बसत आहेत असेही वाटते. रोम्युलसच्या किंवदंतेपासून अलीकडच्या काळात रोममध्ये घडलेल्या घटनांपर्यंतच्या सगळ्या प्रमुख घटना एकापाठोपाठ दाखवल्या जात असतांना आपण खुर्चीला खिळून राहतो. ज्यूलियस सीझरचा खून, रोम जळत असतांना नीरोचे फिडल वाजवीत शांत राहणे, कांही युद्धाचे किंवा आक्रमणाचे प्रसंग फारच परिणामकारक वाटतात. एकदा रोममध्ये उंदरांचा सुळसुळाट झाला होता असे सांगतांना अचानक पायापाशी हवेचा बारकासा झोत आल्याने आपण एकदम दचकून पाय वर उचलतो. एकंदरीत अर्ध्या पाऊण तासात आपले पैसे वसूल झाल्याचे समाधान मिळते. रुक्ष वाटणारा किंवा फारसा ओळखीचा नसलेला इतिहाससुद्धा किती मनोरंजक पद्धतीने सांगता येतो याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणावे लागेल.
. . . . . (क्रमशः)

Friday, April 17, 2009

ग्रँड युरोप - भाग २- रोम येथे आगमन


दि. १६-०४-२००७ रोम येथे आगमन
पंधरा एप्रिलच्या रात्री बारा वाजून गेल्यानंतर म्हणजे सोळा तारीख सुरू झाल्यानंतर तासाभराच्या आंतच आमच्या विमानाने मुंबईहून उड्डाण केले व ते सकाळी उजाडायच्या सुमारास व्हिएन्नाला पोचले. 'थ्रू चेक इन' केलेले असल्यामुळे पुढच्या प्रवासाची बोर्डिंग कार्डस आधीच मिळालेली होती आणि चेक्ड इन बॅगेज परस्पर रोमला जाणार होते. हँड बॅगेज तेवढे घेऊन खाली उतरलो. विमानतळावर पुढे कुठे जायचे, कसे जायचे वगैरे मार्गदर्शन संदीप करीत होता. त्यामुळे शोधाशोध करण्याची गरज नव्हती. घोळक्याबरोबर जात असल्याने वाट चुकण्याची भीती नव्हती. या जागीच युरोपियन युनियनमध्ये प्रवेश होत असल्यामुळे पासपोर्ट व्हिसा वगैरेची तपासणी होऊन त्यावर इमिग्रेशनचा शिक्का बसला. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून दुस-या विमानाने रोमला गेलो. या विमानातले बहुतेक प्रवासी आमच्यासारखे पर्यटकच दिसत होते. त्यांत एक चिनी किंवा जपानी लोकांचे घोळके होते, तसेच एक युरोपियन मुलामुलींचा ग्रुप होता. त्यांचे आपापसात हंसणे खिदळणे, झोंबाझोंबी व मौजमस्ती मुक्तपणे चालले होते. त्यामुळे वातावरण चैतन्यमय झाले होते.
सकाळची वेळ होती. स्वच्छ सूर्यप्रकाशांत वाटेत लागणा-या पर्वतांची हिमाच्छादित शिखरे चकाकत होती. तसेच त्याखाली हिरवी गर्द वनराई आणि हिरव्या किंवा पिवळ्या रंगाने कुंचल्याने रंगवल्यासारखे शेतांचे चौकोन दिसत होते. आकाश निरभ्र असल्यामुळे खालचे मनोहर दृष्य विमानातून स्पष्ट दिसत होते. विमानात सगळ्यांना सरसकट एकच प्रकारचा हलकासा नाश्ता होता, त्यांत शाकाहारी किंवा मांसाहारी असा भेदभाव नव्हता. त्यात कसले पदार्थ होते ते धड समजत नव्हते. अजून भूकही लागलेली नव्हती. त्यामुळे कुणी त्यातले कांही खाल्ले, कुणी नाही.
दीड तासांनंतर रोमचे विमानतळ आले. मी बावीस तेवीस वर्षानंतर पुन्हा एकदा 'लिओनार्दो दा विंची' एअरपोर्टवर उतरत होतो. याच ठिकाणी मी युरोपच्या भूमीवर माझे पहिले पाऊल ठेवले होते ते आठवले. आता परिस्थिती बरीच बदलली होती. विमानातून जमीनीवर खाली उतरण्याची गरजच नव्हती. एरोब्रिजमार्गे सरळ विमानतळाच्या इमारतीत प्रवेश झाला. स्वागताला बंदूकधारी कमांडोज नव्हते. आम्ही ऑस्ट्रियामधून आलेलो असल्यामुळे इमिग्रेशनचे चेकिंग करण्याची गरज नव्हती. संदीपच्या पाठोपाठ आम्ही सगळे यात्रेकरू सामान आणणा-या कन्व्हेयर बेल्टपाशी येऊन उभे राहिलो.
व्यापारीकरण व यांत्रिकीकरण झालेल्या आधुनिक युरोपमधल्या संस्कृतीचे पहिले दर्शन रोमला पोचतांच घडले. सामान उचलणारे भारवाही हमाल तर इथून पूर्वीच अदृष्य झालेले होते, पण स्वतःच्या हाताने ढकलायच्या ट्रॉल्यासुद्धा आता तिथे मोफत उपलब्ध नव्हत्या. त्या सगळ्या एका जागी यांत्रिक रीतीने एकमेकांत अडकवून ठेवलेल्या होत्या. त्या यंत्रात एक युरोचे नाणे टाकले की त्यातली समोरची एक ट्रॉली सुटी होऊन बाहेर निघत होती. नोट आत सरकवली की सुटी नाणी देणारे ऑटोमॅटिक व्हेंडिंग मशीन बाजूलाच होते. बहुतेकांनी त्यातून सुटी नाणी घेऊन एक एक ट्रॉली काढून घेतली. त्यांतही कांही लोकांनी एक युरो म्हणजे साठ रुपये असा हिशोब करून "आमच्या बॅगांना ओढून नेण्यासाठी अंगचीच चाके लावलीच आहेत की, पुन्हा मग भाड्याची ट्रॉली कशाला?" असा विचार करून एक युरो वाचवला.
दहा पंधरा मिनिटांत सामान मिळेल अशी सगळ्यांचीच अपेक्षा होती आणि सर्व प्रवाशांनी कन्व्हेयर बेल्टला अक्षरशः गराडा घातला होता. पण पाऊण तास झाला तरी तो हलायला तयार नव्हता. आजूबाजूला बसायचीही कांही सोय नव्हती. त्यामुळे कंटाळलेल्या लोकांनी कुठे खांब, कुठे भिंत, कुठे पायरी, सरतेशेवटी सामानाची ट्रॉली, अशा मिळेल त्या आधाराला टेकायला हळूहळू सुरुवात केली. भारतात सुद्धा कुठेही विमानातील सामान यायला इतका विलंब लागलेला मला आठवत नाही. शेवटी एकदाचा तो पट्टा फिरायला लागला आणि पुन्हा सगळे लोक तिकडे धांवले आणि तिथे ही गर्दी झाली. त्यानंतरही एक एक दोन दोन करीत संथगतीने त्यावरील सामान येत होते. आपले सामान आलेले पाहून एक एक जण सुस्कारा टाकीत सामान घेऊन बाजूला होत होता. शेवटचे सामान येईपर्यंत तासभर उलटून गेला होता. आपापले सामान मिळाले हे ही नसे थोडके असे वाटले. मागच्याच वर्षी लीड्सच्या विमानतळावर उतरल्यानंतर आपले सामान मागेच राहिले असल्याचा अनुभव ताजा होता.
संदीपने सगळ्या कळपाला एकत्र गोळा केले आणि आधीच उशीर झाला असल्याकारणाने घाईघाईने चलायला सांगितले. पण प्रत्यक्षात बाहेरच्या पॅसेजमध्ये नेऊन तिथेच थांबवले आणि "मी जरा बाहेर जाऊन बस पाहून येतो." असे सांगून तो स्वतः नाहीसा झाला. रात्रभरच्या प्रवासाचा शीण, बसल्या स्थितीत अर्धवट झोप झाली असल्याने आंबलेले अंग, सकाळी नीट नाश्ता न झालेला आणि सामानाची वाट पहात तासभर ताटकळत उभे राहणे यामुळे सगळे पार थकले भागलेले दिसत होते. "मारे उत्साहाने नवे जग पहाण्यासाठी करीत असलेल्या ग्रँड युरोप टूरची ही असली सुरुवात?" असेच विचार मनात येत होते. कदाचित त्यामुळे असेल, पण पुढील प्रतीक्षेचा प्रत्येक क्षण असह्य वाटायला लागला होता.
संदीप जसा गेला होता तसाच एकदम उगवला आणि आपली बस बाहेर उभी असल्याची सुवार्ता त्याने दिली. आलेली मरगळ झटकून सगळेजण बाहेर आलो. थोड्याशा अंतरावर आमच्यासाठी आणलेली अद्ययावत वातानुकूलित बस उभी होती. भारतात पाहिलेल्या कोठल्याही व्हॉल्व्होपेक्षा अधिक प्रशस्त व आरामशीर सीट्स त्यात होत्या आणि उतारूंना चढण्या उतरण्यासाठी एक पुढे आणि एक मधोमध असे दोन स्वतंत्र दरवाजे होते. सामान ठेवण्यासाठी मोठे होल्ड्स होते, बटन दाबून उघडझाप करणारे दरवाजे त्यांना बसवले होते. सर्व सदस्यांना सुरुवातीसच आसन क्रमांक दिले गेले. यापुढील संपूर्ण सहलीमध्ये तेच कायम राहतील असा केसरीचा नियम आहे असे सांगितले गेले. प्रत्येक थांब्यावर बसमधले सगळे प्रवासी परत आले आहेत याची खात्री करून घेण्याच्या दृष्टीने व एखादी जागा रिकामी असल्यास कोण यायचा आहे ते चटकन कळावे यासाठी ते आवश्यक होते.
आपापले सामान बसमध्ये ठेऊन सगळेजण आपापल्या जागांवर स्थानापन्न झाले. "मंगलमूर्ती मोरया" च्या गजराने आमच्या युरोपदर्शन सहलीचा शुभारंभ झाला. पण अंगावर घामेजलेले, मळलेले व चुरगळलेले कपडे, अस्ताव्यस्त केस, दाढीचे वाढलेले खुंट, कोमेजलेले चेहेरे अशा अवस्थेत आम्ही सुंदर रोमनगरीचे दर्शन घेणार होतो कां? दूरचा प्रवास केल्यावर सर्वप्रथम आपण आपल्या तिथल्या मुक्कामाच्या जागी जातो, गरम गरम चहाचे दोन चार घोट मिळाल्यास घशाखाली उतरवतो, कढत पाण्याचा शेक घेत घेत स्वच्छ स्नान करून धुतलेले कपडे घालून थोडा वेळ निवांत पडतो आणि चार घास खाऊन घेतल्यानंतर पुढच्या कामाला लागतो. प्रवासाने आलेला थकवा घालवून ताजेतवाने होण्याची हीच एक रीत आहे अशी माझी समजूत होती. आतापर्यंत बहुतेक वेळी मी असेच करत आलो होतो. पण सामूहिक सहलीत भाग घेतल्यानंतर मनासारखे करण्याचे स्वातंत्र्य कुठे असते? आपला मार्गदर्शक जे सांगेल तसे करावे लागते. त्यामुळे बसमध्ये बसल्यावर ती जिथे नेईल तिथेच जायचे होते.
तिथून निघाल्यावर रोमचे कांही हमरस्ते आणि कांही उपमार्ग यावरून धांवत ती महाराजा नांवाच्या भोजनगृहासमोर येऊन थांबली. पोटात तहान आणि भूक लागली होती आणि बरोबर घेतलेले फराळाचे पदार्थ अजून सामानांत अडकलेले होते. त्यामुळे आम्हीसुद्धा भोजनासाठी आतुर झालो होतो, पण महाराजाला अजून पूर्णपणे जाग आलेली नसल्यामुळे त्याच्या वाड्याचा दरवाजा बंद होता. आंगणातच एक खुर्च्यांचा ढीग होता. हळू हळू त्यातलीच एक एक खुर्ची काढून एक एकजण त्यावर आसनापन्न झाले आणि एकमेकांच्या ओळखी करून घेऊ लागले. थोड्याच वेळात भोजनालयाचे महाद्वार उघडले आणि आम्ही आत जाऊन जेवायला बसलो. रोमसारख्या शहरात भारतीय पद्धतीच्या नांवाने काय खायला मिळणार आहे याची शाश्वती वाटत नव्हती. त्या मानाने फारच चांगले जेवण मिळाले. त्यांचे नान कांहीसे पिझाच्या बेससारखे वाटत होते. पण तोंडीलावणी रुचकर होती. अती मसालेदार किंवा तेलकटही नव्हती. पोटभर चविष्ट जेवण मिळाल्याने अंग सुखावले आणि बसमध्ये पेंगत पेंगत आमच्या राहण्याच्या हॉटेलला पोचलो. सामानसुमान घेऊन आपापल्या खोल्यांवर जाऊन, विश्रांती घेऊन तयार होण्यासाठी तासाभराचा वेळ दिला होता. सगळ्यांनाच युरोपातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची अतीव उत्सुकता असल्यामुळे बत्तीस लोकांचा आमचा ग्रुप अगदी दिलेल्या वेळेबरहुकूम बसपाशी हजर झाला. आता आमच्या ग्रँड युरोपदर्शनाची खरी सुरुवात झाली.
. . . . . . . (क्रमशः)

Thursday, April 16, 2009

ग्रँड युरोप - भाग १ - प्रास्ताविक


दोन वर्षांपूर्वी १६ एप्रिललाच आम्ही युरोपच्या दौ-यावर जायला निघालो। त्या प्रवासात आलेले अनुभव शब्दबध्द करून ठेवले आहेत ते क्रमाक्रमाने देण्यास आजपासून सुरुवात करत आहे. ही मालिका जरा लांबच असल्यामुळे थोड्या थोड्या कालावधीने अधून मधून इतर विषयांवरील लेख देत राहणार आहे.
२००७चे नवे वर्ष सुरू होताच नव्या वर्षात काय काय करायचे याचा विचारही सुरू झाला होता. कौटुंबिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक वगैरे सगळ्या परिस्थिती व अवस्था विचारात घेतल्यानंतर आम्ही उभयतांनी या वर्षी टूरिस्ट कंपनीबरोबर एक छानशी सहल करून येणे ही सर्वोत्कृष्ट कल्पना आहे असे सर्वानुमते ठरवण्यात आले. वर्तमानपत्रात व टीव्हीवर रोज दिसणा-या अनेक प्रकारच्या अतिशय आकर्षक जाहिरातींचासुद्धा या निर्णय प्रक्रियेवर परिणाम झाला असल्याची दाट शक्यता आहे. काश्मीर, कन्याकुमारी व सिक्कीम ही भारताची तीन टोके माझी पाहून झालेली होती. मधला बराचसा भाग नजरेखाली येऊन गेला होता. उरलेला भाग थोडा थोडा करीत पाहणे चालूच होते. युरोप पहायची इच्छा मात्र बालपणापासून मनात घर करून राहिली होती, त्यामुळे युरोपची निवड होणे ओघानेच आले.
कुठल्या कंपनीची कुठली सहल निवडायची हा एक यक्षप्रश्न होता. ज्या कंपन्यांच्या मोठ्या जाहिराती पाहण्यात येतात त्यात केसरीचे नांव ठळकपणे नजरेसमोर येत होते. दोन तीन लोकांनी त्यांच्या व्यवस्थेसंबंधी अनुकूल मतही दिले होते म्हणून केसरीच्याच ऑफीसात प्रथम चौकशी करायला गेलो. त्यांच्या अद्ययावत पद्धतीच्या वातानुकूलित ऑफीसात प्रवेश करताच सस्मित स्वागत करून आम्हाला एका कॉन्फरन्स रूममध्ये बसायला सांगितले. तिथे एका मोठ्या स्क्रीनवर वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळे व्हीडिओवर दाखवत होते. तिथे बसलेल्या सगळ्यांना शीत पेय व चहा देण्यात आला. येणा-यावर पहिले चांगले इम्प्रेशन कसे पाडायचे असते हे इथे येऊन पहावे असे वाटले.
थोड्याच वेळात आम्हाला बोलावून एका एक्झिक्यूटिव्हकडे नेण्यात आले. परदेशी सहलीला जायचे आहे म्हणताच तिने केसरीचेच एक माहिती पुस्तक उघडले. दर दोन पानात मिळून एक अशा पन्नास साठ तरी वेगवेगळ्या सहलींची सविस्तर माहिती त्यात दिली होती. युरोपला जायचे आहे असे सांगितल्यावर त्यातही अनेक पर्याय होते. आमच्या वयोमानाचा विचार करता त्यातील 'ग्रँड युरोप' ही सर्वोत्तम सहल आहे असे तिने सुचवले. फार धांवपळ होणार नाही आणि कांही चांगल्या गोष्टी पाहिल्याचे समाधानही मिळेल अशा हृष्टीने या सहलीची योजना केली असल्याचे तिने सांगितले. हॉलंडमधील ट्यूलिप्सच्या बागा पहायच्या असल्यास लवकरच जायला हवे होते, तशा लवकर सुरू होणा-या सहलींमध्ये थोड्याच जागा शिल्लक राहिल्या होत्या आणि दोन दिवसात कागदपत्रे आणून दिली तरच वेळेवर व्हिसा मिळणे शक्य होते, असे असल्याने लगेच आमचे बुकिंग करून टाकले. साधी चौकशी करायला गेलो असतांना तत्क्षणी निर्णय
घेऊन टाकण्याची मला संवय झाली आहे. त्यावर पश्चात्ताप करायची वेळ कधी आली नाही. त्यामुळे कोणाला त्याचे आश्चर्य वाटत नाही आणि "इतकी घाई कशाला केली?" असेही कोणी सहसा म्हणत नाही.
परत येतांयेतांच व्हिसासाठी आवश्यक असणारे फोटो काढायला स्टूडिओमध्ये जायचे मनात होते पण पत्नी त्यासाठी सजून 'तयार' नव्हती म्हणून घरी जावे लागले. "हा फोटो फक्त व्हिसावर लावण्यासाठी हवा आहे. विमानाचा लांबचा प्रवास करून झाल्यानंतर इमिग्रेशनवरच्या काउंटरला तुझा चेहेरा यातल्या फोटोसारखा दिसला पाहिजे. त्या वेळी तू तिच्याकडे मेक अप वगैरे करून जाणार आहेस कां?" वगैरे तिला समजावून सांगितल्यानंतर 'तयारी'च्या वेळेतली पांच मिनिटे कमी करण्यात आली. दुस-या दिवशी बँकेची
स्टेटमेंट्स वगैरे गोळा करून झाल्यावर आमचे अस्तित्व सिद्ध करणारे उरले सुरले सगळे भरभक्कम पुरावे जमवले, त्याच्या तीन तीन प्रती काढल्या, दोन अप्लिकेशन फॉर्मांच्या चार चार प्रती हांताने लिहून भरल्या आणि एकदाचे सगळे कागद केसरीकडे नेऊन दिले. तिकडे जग 'पेपरलेस' कार्याच्या युगात जायला निघाले आहे आणि ते जग पाहण्यासाठी जाणारे आम्ही तेवढ्या कारणासाठी बॅग भरून कागदपत्रे तयार करीत होतो.
व्हिसाचे काम सुरळीतपणे चालू आहे हे पाहिल्यावर उरलेले पैसे भरून टाकले. व्हिसासह पासपोर्ट, विम्याची पॉलिसी व विमानाचे तिकीट हे सगळे विमानतळावरच मिळणार असल्याचे समजले. प्रवाशांसाठी उपयुक्त सूचना देणारी एक सीडी मिळाली. त्यांत खूप मनोरंजक माहिती दिली होती. एक सज्जन म्हणे नवे कोरे पायजमे घेऊन युरोपला गेले पण त्यांत घालायला नाडी न्यायला विसरले! मग टूर ऑपरेटरला त्यांच्यासाठी परदेशांत नाडी शोधत हिंडावे लागले. सामान भरण्यासाठी केसरीकडून छानशा बॅगा भेट दिल्या गेल्या. त्यात मावतील तेवढे कपडे ठेऊन उरलेले सामान आपल्याकडील बॅगांमध्ये भरले आणि सहार विमानतळावरील ठरलेल्या जागी १५ एप्रिलला रात्री दिलेल्या वेळी जाऊन पोचलो.
टूरचे बुकिंग करतांना आपले सहप्रवासी कोण आहेत याची कांही कल्पना नव्हती. आमच्या जोडीला आमच्या ओळखीचे कोणीच नव्हते. इतर प्रवासी कदाचित दोन्ही खिसे भरभरून युरोच्या नोटांच्या गड्ड्या आणतील आणि जिकडे तिकडे ते युरो उधळत जातील, पण आपल्याला तसे करणे जमणार नाही, किंवा ते सगळे तरुण लोक टणाटण उड्या मारीत धावत पुढे जातील आणि आपण त्यांच्या पाठीमागे धापा टाकीत खुरडत जात असू असे स्वप्नात दिसू लागल्यामुळे मनात अस्वस्थता वाटत होती. विमानतळांवर जेंव्हा सगळा ग्रुप जमा झाला तेंव्हा त्यांना पाहून सुखद आश्चर्य वाटले आणि मनांतल्या धाकधुकींची सांवटे अदृष्य होऊन गेली. तिथे जमलेली बहुतेक सगळी मंडळी आमच्यासारखीच, एकाच स्तरातली आणि वयोगटातली दिसत होती. केसरीच्या ग्रुप्समध्ये बहुसंख्य मराठी लोकच असतात एवढे ऐकले होते. पण आमचा गट तर अगदी शंभर टक्के मराठी होता. त्यामुळे गाईडबरोबर व आपापसातले सारे बोलणेमाय मराठीतच झाले.
विमानतळावर पोचल्यावर केसरीकडून ज्याला त्याला ज्याचे त्याचे पासपोर्ट, तिकीटे व विम्याची पॉलिसी वगैरे तर मिळालेच, प्रवासात त्या गोष्टी जपून ठेवण्यासाठी गळ्यात अडकवण्याचा सुरेख तसाच मजबूत पाउचसुद्धा दिला गेला. दुस-या एका छोट्या पाउचमध्ये टूथ ब्रश, टूथपेस्ट, रेझर, क्रीम, बँडएड, गाउज वगैरेचा संच होता. एका वेगळ्या पॅकेटमध्ये पुरणपोळी, चकली, खाकरा, वेफर्स, डिंकाचे लाडू, चॉकलेट व लिमलेटच्या गोळ्या, सुका मेवा, मुखशुद्धी, चटणी, लोणचे वगैरे अनेक प्रकारच्या टिकाऊ वस्तू भरलेली छोटी छोटी पॅकेट्स होती. प्रवासात वाटेत कुठेही भूक लागली किंवा खाण्याची इच्छा झाली तर कांही तरी तोंडात टाकायची सोय केलेली होती. मात्र या गोष्टी केबिन बॅगेजमध्ये कदाचित नेऊ देणार नाहीत, तेंव्हा प्रत्येकाने त्या चेक्ड इन बॅगेमध्ये टाकून घ्याव्यात अशी सूचना मिळाल्यावर प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. घरून निघतांना त्यांनी कांही विचार करून प्रवासाच्या बॅगा भरल्या होत्या. आता त्यातल्या कांही गोष्टी बाहेर काढून हे फराळाचे पदार्थ आंत ठेवावे लागले व जास्तीच्या गोष्टी हांतात धराव्या लागल्या. एअरपोर्टवर
असलेल्या रेस्तरॉंमध्ये स्नॅक्स घेतांघेताच सामानाची ही जमवाजमवी करून घेतली.
त्याच दिवशी ग्रँड युरोपच्या सहलीवर निघालेले केसरीचे दोन ग्रुप होते. आमचा ग्रुप ऑस्ट्रियन एअरने व्हिएन्नामार्गे रोमला जाणार होता आणि दुसरा ग्रुप अलइटालियाने मिलानमार्गे तेथेच पोचणार होता. आतापर्यंत आम्ही एकत्रच बसलो होतो. आमचे ग्रुप एस्कॉर्टस आल्यावर त्यांनी आपापल्या सदस्यांना वेगवेगळे बोलावून घेतले आणि महत्वाच्या सूचना दिल्या. आमच्या ग्रुपमधील प्रत्येकाचे नांव व पत्ता लिहिलेला एक कागद आणि प्रवासातील प्रत्येक टप्प्यावरील उतरण्याच्या ठिकाणांची यादी विमानतळावर आल्यावरच प्रत्येकाला दिलेली होती. संदीप पाटील हा आमचा वाटाड्या होता. याच नांवाच्या प्रसिद्ध क्रिकेटपटूशी त्याचा कांही संबंध नाही हे त्याने आल्या आल्याच सांगितले. त्याच्या बरोबर आम्ही इमिग्रेशन, कस्टम, सिक्यूरिटी वगैरे चेक्स पार करून प्रयाणकक्षात गेलो. जे लोक प्रथमच परदेशी जात होते त्यांना थोडेसे मार्गदर्शन करावे लागले. पण त्यासाठी फारसे कांही प्रयास पडले नाहीत. आजकाल एवढे सामान्यज्ञान प्रत्येकाकडे असते. ठरलेल्या वेळी आमच्या विमानाने व्हिएन्नाच्या दिशेने उड्डाण केले.
. . . . . . . (क्रमशः)

Monday, April 13, 2009

कोंडी - भाग १ -४

चार भागात लिहिलेली ही कथा आज एकत्र करून दिली आहे.
२१ जून २०१८

 भाग १


अगदी आडबाजूला असलेल्या एका लहान गांवातल्या एका बाळबोध वळणाच्या कुटुंबात जन्या जन्माला आला, तिथल्या सरकारी शाळेत गेला आणि तिथेच लहानाचा मोठा झाला. शाळेत जाऊन तो नक्की काय काय शिकला ते सांगणे थोडे कठीण आहे, पण त्या काळातली बहुतेक मुले शाळेत जाऊन जे कांही करायची तेच तोसुध्दा करत असे. शिक्षकांच्या नेमणुका, बदल्या वगैरेंची सूत्रे दूर कुठेतरी असलेल्या शिक्षणखात्याच्या मुख्यालयातून हलवली जात असल्यामुळे त्या लहान गांवातल्या शाळेतल्या वर्गांची आणि ते सांभाळणार्‍या शिक्षकांची संख्या यातले गणीत कांही नेहमीच सरळ सोपे नसे. नेमून दिलेल्या मास्तरांपैकी कोणाची गांवाजवळच शेतीवाडी नाही तर गांवात दुकान असायचे, आणिक कोणी पूजाअर्चा, अभिषेक वगैरेमध्ये मग्न असत. त्या व्यापातून वेळ मिळेल तसे ते शाळेत येत, वर्गातल्या मुलांना बाराखड्या, जोडाक्षरे किंवा पाढे लिहून काढायला सांगत आणि खुर्चीवर बसून आराम करत असत. परीक्षेत मात्र ते मुलांना सर्वतोपरी प्रयत्न करून वरच्या वर्गात ढकलत असत. बहुतेक सारी मुलेसुध्दा शेतीची कामे, दूधदुभते, सुतारकाम, लोहारकाम, विड्या वळणे वगैरे घरातल्या उद्योग व्यवसायाला हातभार लावत असत. जेंव्हा त्यांना देण्याजोगे काम नसे त्या वेळी घरातला दंगा कमी व्हावा म्हणून त्यांना शाळेत पिटाळले जात असे. वर्गात डोकावून पाहून गुरूजी दिसले नाहीत की ते शाळेच्या प्रशस्त आवारात गोट्या, विटीदांडू, लपंडाव वगैरे खेळू लागत किंवा चिंचा, आवळे, बोरे, कैर्‍या वगैरे ऋतुकालोद्भव फळांच्या झाडांकडे आपला मोर्चा वळवत. कांही मुले वर्गातच बसून गप्पा व थापा मारणे, नवनव्या गोष्टी सांगणे, कविता किंवा गाणी म्हणणे वगैरे गतिविधींमध्ये आपला वेळ घालवत आणि मास्तर येतांना दिसले तर बाहेर जाऊन आपल्या वर्गातल्या मुलांना गोळा करून आणत. जन्याचे कधी या गटात तर कधी त्या गटात असे आंतबाहेर चालले असे. प्राथमिक शाळेत असा आनंद होता.
माध्यमिक शाळेत गेल्यानंतर वर्गात उपस्थित असणारे विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांच्या संख्येत थोडी वाढ झाली. त्याबरोबरच वर्गात बसल्या बसल्या टिंगल-टवाळ्या, कुचाळक्या वगैरें करण्याचे नवनवे प्रयोग मुले करू लागली. जन्या त्यात उत्साहाने सहभागी होत राहिला. मॅट्रिकच्या परीक्षेचे पेपर बाहेरून येत आणि तपासण्यासाठी बाहेर पाठवले जात यामुळे त्या परीक्षेची सर्वांनाच धास्ती वाटत असे. शाळेतले त्यातल्या त्यात कामसू आणि अनुभवी शिक्षक जास्तीचे खास वर्ग घेऊन परीक्षेचा सारा अभ्यासक्रम संपवत असत. जन्याला अभ्यासची गोडी कधी लागली नसली तरी त्याचे डोके तल्लख असल्यामुळे कानावर पडलेल्या कांही गोष्टी त्याच्या लक्षात राहिल्या, नशीबाने त्याला थोडी साथ दिली आणि शाळेचा मॅट्रिक परीक्षेचा निकाल जेमतेम वीस बावीस टक्के लागला असला तरी त्यात जन्याचा नंबर लागून गेला. एकदाचे गंगेत घोडे न्हाले.
जन्याच्या गांवात महाविद्यालय नव्हते आणि त्याने शहरात राहून शिक्षण घेण्याइतकी त्याच्या कुटुंबाची ऐपत नव्हती. त्यामुळे कॉलेज शिकण्याचे स्वप्न त्याने कधी पाहिलेच नव्हते. किंबहुना स्वप्नरंजन हा प्रकारच त्याला माहीत नव्हता. आज मिळते तेवढी मौजमजा करून घ्यायची, उद्याचा विचार उद्या करू, त्याचा ताप आज कशाला ? असे तो वर्तमानकाळातच जगत आला होता. पण मॅट्रिकचा अडसर त्याने पहिल्या फटक्यात ओलांडल्याचे ऐकून शहरात राहणार्‍या त्याच्या कांही आप्तांनी मदतीचा हात पुढे केला. त्या काळात तांत्रिक शिक्षणाला आजच्याइतकी मागणी नव्हती, पण भविष्यकाळाचा विचार करून कांही नवी तंत्रशिक्षणाची केंद्रे उघडली गेली होती. तशा एका तंत्रनिकेतनात त्याला प्रवेश मिळवून दिला, आर्थिक दुर्बलतेच्या आधारावर नादारी मिळाली आणि कोणा उदार गृहस्थांकडे राहण्याजेवण्याची सोय झाली. अशा प्रकारे कांहीशा अनपेक्षित रीतीने जन्याचे उच्च शिक्षण सुरू झाले.
पण त्यापूर्वी त्याने कधीही मन लावून अभ्यास केला नव्हता किंवा अंग मोडून कामही केले नव्हते. तंत्रनिकेतनातील शिक्षणात रोज तीन चार तास कार्यशाळेत किंवा चित्रशाळेत उभे राहून काम करावे लागे आणि त्याशिवाय तीन चार तास कधी न ऐकलेल्या विषय़ांवरील व्याख्याने ऐकावी लागत असत. त्यानंतर घरी येऊन त्याचा अभ्यास करायचा. हे बहुतेक सारे विषय विज्ञान आणि गणितावर आधारलेले होते आणि ते इंग्रजी माध्यमातून शिकायचे होते. गणीत, विज्ञान आणि इंग्रजी हे विषय जन्याचे जरा जास्तच कच्चे राहिले असल्यामुळे वर्गात शिकवलेले समजत नव्हते आणि ते शिकण्यात रस वाटत नव्हता. आलेला दिवस जनार्दन कसाबसा ढकलत होता. अखेर पहिल्याच परीक्षेत तो एकूण एक विषयात नापास झाला आणि त्याचे बिंग फुटले. ज्यांनी त्याला मदत केली होती त्यांना ती वाया गेल्याचा राग आला आणि ज्यांनी त्यासाठी आपला शब्द टाकला होता ते तोंडघशी पडले. शहरातला आधार न राहिल्यामुळे जनार्दन गांवाकडे परत गेला.
पण तिथले चित्र तोंपर्यंत बदलले होते. त्याच्या वर्गात शिकणारी धनिक लोकांची मुले कॉलेजच्या शिक्षणासाठी शहरांत गेली होती. त्यातली कांही मुले तिथे अभ्यासात चांगली प्रगती करत होती, पण ज्यांना ते एवढे जमत नव्हते ती सुध्दा त्या निमित्याने शहरात राहू शकत होती. गरजू मुले वेगवेगळ्या जागी नोकरीला लागली होती किंवा नोकरीच्या शोधात हिंडत होती. ज्या मुलांचा घरचा उद्योग व्यवसाय होता ती पूर्णवेळ कामाला लागली होती. जनार्दनाबरोबर घालवण्यासाठी आता त्यातल्या कोणाकडेच फारसा वेळ नव्हता. घराची सांपत्तिक परिस्थिती सुधारण्यासाठी घरातले लोक त्याच्याकडे डोळे लावून बसलेले होते. त्यांची बोलणी आणि शेजार्‍यांचे टोमणे सहन करणे दिवसेदिवस कठीण होत चालले होते. थोड्याच दिवसात आपले बालपण संपले असल्याचे त्याच्या ध्यानात आले आणि तो नोकरीच्या शोधाला लागला.
. . . . . . . .
------------------------------------

भाग २


'अन्नासाठी दाही दिशां'ना शोध घेता घेता जनार्दनाला मुंबईजवळच्या एका गांवात नोकरी मिळाली. तिथल्या नगरपालिकेच्या जकातनाक्यावर कारकुनाच्या जागेवर त्याची नेमणूक जाली. 'पोटापुरता पसा' मिळण्याची सोय झाली आणि त्या गांवात राहणार्‍या एका नातलगाच्या बाल्कनीत पथारी पसरून झोपायला आडोसा मिळाला. अशा प्रकारे त्याच्या जीवनाचा दुसरा खंड सुरू झाला. तिथले काम फारसे कठीण नव्हते, पण नोकरीच्या तीन पाळ्या असत, त्यामुळे कधी भल्या पहाटे, कधी भर दुपारच्या उन्हात, तर कधी अपरात्री तंगड्या तोडत गांवाच्या वेशीपर्यंत जावे यावे लागत असे. पावसाळ्याच्या दिवसात पाऊसवारा सहन करत पाण्यातून व चिखलातून जाणे त्याच्या जीवावर येत असे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आता त्याला स्वतःलाच प्रयत्न करावे लागणार आहेत हे त्याला पूर्णपणे कळून चुकले.

कामावर नसतांना तसेच असतांनाही त्याला भरपूर मोकळा वेळ मिळायचा. त्याचा सदुपयोग करून घेऊन त्याने सार्वजनिक आरोग्यावरचा एक लहानसा अभ्यासक्रम पुरा केला आणि त्याचे प्रमाणपत्र प्राप्त केले. त्याच्या आधारावर त्याला नगरपालिकेच्या आरोग्यविभागात बदली मिळाली. महिन्याचा पगार, कामाची जागा आणि कामाचे तास या तीन्ही गोष्टीत चांगला फरक पडला. दीड दोन वर्षे लक्षपूर्वक काम करून त्याने त्या कामाबाबतची सगळी माहिती शिकून घेतली. शिवाय इकडे तिकडे त्याचे लक्ष होतेच. मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत कांही जागा रिकाम्या असल्याचे कळताच त्याने त्यासाठी अर्ज केला. 

चांगल्या व्यक्तीमत्वाची देण जनार्दनाला जन्मतःच मिळालेली होती, त्याचा स्वभाव बोलका होता आणि कामाबद्दलची माहिती आणि अनुभव यातून त्याचा आत्मविश्वास वाढला होता. इंटरव्ह्यूमध्ये त्या जागेसाठी त्याची निवड झाली आणि मुंबईच्या सीमेच्या पलीकडे असलेल्या लहान गांवातून तो मुख्य महानगरात आला. तरी त्याची पहिली नेमणूक मुंबईच्या पार सीमेवरच्या एका उपनगरात झाली होती. त्या काळात दळणवळणाची आणि संदेशवहनाची एवढी साधने नव्हती तसेच त्या भागात इतर नागरी सुखसोयीसुध्दा फारशा सुलभ नव्हत्या. त्या बाबतीत तो भाग थोडा गैरसोय़ीचा असल्याने मुंबईमधील रहिवासी तिथे जाऊन राहण्यास फारसे उत्सुक नसायचे. योगायोगाने जनार्दन नोकरीला लागल्यानंतर लवकरच तिथल्या महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांच्या वसाहतीतली एक जागा रिकामी झाली आणि जनार्दनाला ती विनासायास मिळून गेली. 

पंचविशी गाठेपर्यंत जनार्दन नोकरीत चांगला रुळला होता, रहायला जागा मिळाली होती आणि कामावर जाण्यायेण्यासाठी त्याने हप्त्यांवर एक स्कूटर घेतली होती. साहजीकच उपवर कन्यांच्या पालकांची नजर त्याच्याकडे गेली आणि त्याच्यासाठी वधूसंशोधन सुरू झाले. या बाबतीतही त्याचे दैव जोरावर होते. फार काळ वाट पहावी न लागता अनुरूप अशी जीवनसंगिनी त्याला सापडली आणि जान्हवीबरोबर तो विवाहबध्द झाला. जान्हवी सर्व दृष्टीने जनार्दनाला हवी तशीच, किंबहुना त्याला पूरक अशी होती. प्राप्त परिस्थितीतील अडचणी व गैरसोयींबद्दल कुरकुर करत न बसता त्यात जमेल तेवढी सुधारणा करायची आणि उरलेल्यांची खंत मनात न बाळगता त्या शांतपणे सोसायच्या असे तिचे जीवनसूत्र होते. त्याचबरोबर मिळत असलेले सुख आनंदाने उपभोगायची तिची वृत्ती होती. जीवनात जास्त आनंद निर्माण करण्यासाठी प्रयत्न आणि कष्ट करायला ती नेहमी तयार असे. घराजवळच असलेल्या महानगरपालिकेच्या इस्पितळात तिलाही नोकरी मिळाली आणि दुहेरी अर्थार्जनाचे सुपरिणाम दिसू लागले. रंगीत टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर, टेलीफोन, धुलाईयंत्र वगैरे उपयोगाच्या एकेक आधुनिक काळातल्या वस्तू त्यांच्या घरात येत गेल्या. 

जनार्दन आणि जान्हवीच्या संसारात प्राजक्ताने चिमुकले पाऊल टाकले आणि एका अनोख्या सुगंधाने तो दरवळला. लहानग्या प्राजक्ताचे अत्यंत मायेने लालन पालन होत गेले. तिला वसाहतीमधल्या इतर मुलांबरोबर तिथल्या महापालिकेच्या शाळेत न घालता मैलभर अंतरावरील एका नामांकित संस्थेच्या विद्यालयात शिकायला पाठवले. शाळेत जायच्या आधीच घरच्या घरी तिचा अभ्यास सुरू झाला होता. जान्हवीने तिच्या शिक्षणाकडे बारीक लक्ष ठेवले होते आणि प्राजक्ता सुध्दा अभ्यासात हुषार निघाली. पहिल्या इयत्तेत तिने वर्गात पहिला क्रमांक मिळवला आणि शालांत परीक्षेपर्यंत तो टिकवून धरला. त्यानंतर ती इंजिनियरिंग कॉलेजला गेली आणि तिथेही प्रत्येक वर्षी पहिला वर्ग टिकवून धरून ती उत्तम टक्केवारी घेऊन पदवीधर झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र तेंव्हा चांगले जोरात प्रगतीपथावर होते. एका प्रतिष्ठित कंपनीतली चांगल्या लठ्ठ पगाराची नोकरी प्राजूकडे आपणहून चालून आली. आयुष्याच्या सुरुवातीलाच ती आपल्या आई वडिलांच्या दुप्पट तिप्पट अर्थार्जन करू लागली. तिची प्रगती पहात असतांना जनार्दन आणि जान्हवी मनोमन हरखून जात होते. त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळतांना पाहून त्यांना अपूर्व समाधान वाटत होते. 
. . . . . . . . 

भाग ३


प्राजक्ता नाकीडोळी नीटस तसेच रंगाने उजळ होती, गोडवा आणि शालीनता हे तिचे दोन्ही गुण तिच्या चेहेर्‍यावर स्पष्ट दिसायचे, तिच्या बोलण्यात माधुर्य होते, ती बुध्दीमान होतीच, इंजिनियरिंगची पदवी तिने मिळवली होती आणि एका प्रख्यात कंपनीत ती चांगल्या पदावर नोकरी करत होती. तिचे लग्न तर अगदी चुटकीसरशी जमून जाईल याबद्दल सर्वच आप्तेष्टांना पूर्ण खात्री होती. तिला चांगला मनाजोगता जोडीदार मिळावा असेच सर्वांना आपुलकीपोटी वाटत होते आणि त्यातले थोडे श्रेय़ आपल्याला मिळाले तर तेही हवे होते. त्यामुळे शिक्षण पूर्ण करून प्राजू नोकरीला लागताच जो तो आपापल्या वर्तुळात तिच्यासाठी वरसंशोधन करू लागला. वय, उंची, शिक्षण आणि उत्पन्न या चार बाबतीत नवरा मुलगा मुलीच्या मानाने सरस असावा असा सर्वमान्य संकेत आपल्याकडे आहे. त्यात दोघांचे शिक्षण समान असले तरी चालते आणि उत्पन्नाचा आकडा सारखा बदलत असतो, पण लग्न जुळवण्याच्या वेळी तरी वराचेच उत्पन्न वधूपेक्षा जास्त असावे लागते. ठरवून केलेल्या विवाहात सहसा कोणीही परभाषिक, परजातीचे किंवा परधर्माचे स्थळ पहात नाही, सुचवत तर नाहीच नाही. एवढी किमान अवधाने पाळूनसुध्दा प्राजक्तासाठी योग्य अशा विवाहोत्सुक युवकांची कमतरता नव्हती. त्यामुळे सर्वच आप्तस्वकीयांनी आपापल्या परिचयातली दोन चार स्थळे सुचवली. प्राजक्ताचे लग्न जुळवण्याचा विचार मनात येतो न येतो तोंपर्यंत निदान शंभर तरी स्थळांची नांवे, माहिती, पत्ते आणि फोन नंबर जनूभाऊंच्याकडे आले. त्यांनी त्याची छाननी सुरू केली. या बाबतीत मात्र जनूभाऊ, जान्हवी आणि प्राजू यांचे निकष वेगवेगळे होते. त्यामागे तशीच सबळ कारणे होती. 

जनार्दनाचा जनूभाऊ होण्यापर्यंत त्याची प्रगति झाली असली तरी महापालिकेचे सफाई कामगार आणि त्यांनी गोळा केलेला कचरा ट्रकमध्ये भरून तो डंपिंग ग्राउंडमध्ये नेऊन टाकणारे ट्रक ड्रायव्हर यांच्यावर देखरेख ठेवणे हे त्याच्या कामाचे स्वरूप कांही बदलले नव्हते. त्यामुळे दिवसातला त्याचा बराचसा वेळ या लोकांच्या सहवासात जात असे. त्यातील अशुध्द शब्दोच्चारासह त्यांची गांवढळ भाषा त्याच्या जिभेवर बसली होती. कधी कधी अनवधानाने एकादा अपशब्द त्याच्या तोंडातून निघून जात असे. त्याचे दांत तंबाखूच्या सेवनाने रंगले होते आणि त्या लोकांचे हांतवारे, अंगविक्षेप वगैरे जनूभाऊंच्या देहबोलीचा भाग झाले होते. त्याच्या विचारसरणीवरही त्या कामगारांच्या सहवासाचा थोडा प्रभाव पडला असावा. जान्हवीचा संपर्क जास्त करून मध्यम वर्गातील पांढरपेशा महिलांबरोबर येत असे. त्यामुळे तिचे बोलणे, वागणे त्या वर्गाच्या प्रातिनिधिक स्वरूपाचे झाले होते. थोडक्यात सांगायचे झाल्यास ती जुन्या काळातल्या काकूबाईंची पण खूप सुधारलेली आधुनिक आवृत्ती वाटायची. प्राजूला लहानपणापासून जसे घरापासून दूर असलेल्या चांगल्या दर्जेदार अशा शाळेत घातले होते, तसेच घराच्या आसपासच्या मुलांपासूनही तिला थोडे दूरच ठेवले गेले होते. तिच्या बहुतेक वर्गमैत्रिणी उच्च मध्यवर्गीयांच्या हाउसिंग सोसायट्यातल्या फ्लॅटमध्ये रहात असत. प्राजू जसजशी मोठी होत गेली तसतसे तिचे आपल्या मैत्रिणींकडे जाणेयेणे वाढत गेले. इंजिनियरिंगसाठी ती कॉलेजच्या हॉस्टेलवर रहात होती, तिथल्या मैत्रिणी सांपत्तिक व सामाजिक दृष्ट्या अधिकच वरच्या स्तरातून आल्या होत्या. त्यांच्या संपर्कात राहून प्राजक्ताच्या वागण्यात सफाई, अदब आणि रिफाइनमेंट आली होती. वेषभूषा, केशभूषा, सौंदर्यसाधनांचा वापर वगैरे बाह्य स्वरूपाच्या गोष्टींच्या बाबतीत तिने आपल्या आईवडिलांना जितपत पसंत पडेल तितपतच मजल मारली असली तरी अंतरंगातून ती त्यांच्या विश्वापासून खूप पुढे गेली होती. त्या तीघांनीही कधीही ही गोष्ट आपल्या ओठावर येऊ दिली नसली तरी ती त्यांच्या कळत नकळत घडत होती. यामुळे लग्नसंबंधासाठी स्थळांचा विचार करून त्यांची छाननी करतांना त्या तीघांच्या हातात वेगवेगळ्या चाळणी होत्या. 

जनार्दन आणि जान्हवी या उभयतांचे बहुतेक सर्व नातलग मुंबई, पुणे, नाशिक या त्रिकोणातच रहात असल्यामुळे आपले लहानपणी वास्तव्य असलेले खेडेगांव सोडल्यानंतर जनार्दनाचा सारा प्रवास एवढ्या भागातच झाला होता. त्यापलीकडचे विश्व त्याने कधी पाहिलेच नव्हते. त्यामुळे आपल्या लाडक्या कन्यकेला लग्न लावून सातासमुद्रापलीकडे पाठवून द्यायची कल्पनासुध्दा तो सहन करू शकत नव्हता. फार फार तर बडोदा, इंदूर किंवा धारवाडपर्यंत तिला पाठवायची त्याच्या मनाची तयारी होती. प्राजूने आपल्या नजरेच्या टप्प्यात असावे असेच जान्हवीलाही वाटत होते. शिवाय नवरदेवाचे आईवडील, भाऊ बहिणी वगैरे मंडळीसुध्दा त्याच्यासोबतच रहात असली तर उत्तमच, निदान ती गरज पडतांच लगेच येऊ शकतील एवढ्या जवळ असावीत असे तिला वाटत होते. या बाबतीत प्राजूचे मत विचारण्याचा धोका त्यांनी पत्करला नाही. सांगून आलेल्या स्थळांमधली अनेक मुले परदेशी गेलेली होती, किंवा जायच्या तयारीत होती. ज्यांची भावंडे अमेरिकेत आधीच जाऊन स्थायिक झाली होती ती आज ना उद्या जाणारच असे गृहीत धरून अशी सर्व स्थळे जनूभाऊने यादीतून कटाप केली. नोकरीसाठी दिल्ली, कोलकाता किंवा बंगलोरला गेलेल्या मुलांचाही विचार केला नाही आणि ज्यांचे आईवडील डेहराडून किंवा कोचीनसारख्या दूरच्या ठिकाणी रहात होते त्यांनाही बाजूला ठेवले. मुंबई व पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रातल्या इतर विभागात प्राजूपेक्षा जास्त पगार मिळवणारी अशी कितीशी मुले असणार? त्यामुळे तिच्यासाठी वरसंशोधन करण्याचे क्षेत्र मुंबईपुण्याच्या सीमेतच मर्यादित राहिले. 

प्राजूच्या ज्या मैत्रिणींची लग्ने झाली होती त्या माहेरच्या चांगल्या सुखवस्तू घरातून निघून सासरच्या अधिकच प्रशस्त घरी गेल्या होत्या. कांहीजणींची ठरलेली लग्ने त्यांच्यासाठी नवा फ्लॅट बांधून तयार होण्याची वाट पहात थांबवून ठेवली होती. तिलासुध्दा आपला नवा संसार छानशा जागी थाटावा असे वाटले तर त्यात काही विशेष आश्चर्य वाटण्यासारखे नव्हते. पण तिला सांगून आलेल्या स्थळातली कांही मुले सध्या तरी दादर गिरगांवातल्या चाळीत किंवा डोंबिवली भायंदरसारख्या दूरच्या नगरातल्या दोन खोल्यात रहात असलेल्या आपल्या मध्यमवर्गीय आईवडिलांकडे रहात होती. परदेशातल्याप्रमाणे वयात आल्याबरोबर मुलांनी लगेच स्वतंत्र होऊन राहणे अजून आपल्या देशात रूढ झालेले नाही. पुढे त्यांनी गरजेपोटी आपले वेगळे घर केले असतेच, पण लग्न झाल्या झाल्या त्यासाठी पुढाकार घेऊन प्राजूला वाईटपणा घ्यायचा नव्हता. तसेच ते होण्याची वाट पहात त्या माणसांच्या गर्दीत जाऊन राहण्याची तिच्या मनाची तयारी नव्हती आणि तिला तसा आग्रह करावा असे जनार्दनालाही वाटत नव्हते. आधीपासूनच व्यवस्थित परिस्थितीत रहात असलेल्या कुटुंबात लग्नानंतर जायची तिची इच्छा त्यालासुध्दा मान्य होती. 

अशा प्रकारे मुंबईपुण्यात राहणारी सुस्थितीतली स्थळे निवडून त्यातील एकेकाला प्राजक्ताची माहिती, पत्रिका वगैरे पत्राने पाठवायला जनूभाऊंनी सुरुवात केली. तसेच संभाव्य वराची चौकशी केली. पत्रिका पाहणारे लोक गोत्र, मंगळ, एकनाड यासारख्या कांही किमान गोष्टींकडे लक्ष देतातच, सगोत्र विवाह कोणालाच चालत नाही आणि कांही गोत्रांचे आपसात जमत नाही. त्यामुळे त्या मुद्यांवरून १०-१५ टक्के पत्रिका वर्ज्य ठरतात. आकाशातील राशीचक्रातल्या एकूण बारा राशींपैकी पाच राशींमध्ये (म्हणजे सुमारे चाळीस टक्के लोकांच्या पत्रिकेत) मंगळ हा ग्रह असला तर त्या व्यक्तीला मंगळ आहे असे समजले जाते आणि उरलेल्या अमंगळ व्यक्ती त्यांच्याबरोबर लग्न करायला तयार नसतात. कोणाला मंगळ असला तर यात साठ टक्के जागी पत्रिका जुळत नाहीत. जगातील एक तृतियांश म्हणजे तेहतीस टक्के लोकांची नाड एकच असते, ते ही गेले. त्याशिवाय कोणाचा जन्म चांगल्या तिथीवर झालेला नसतो, तर कोणाचे जन्मनक्षत्र अशुभ मानले जाते. अशा सर्व नकारघंटा ऐकल्यानंतर सुमारे वीस टक्के पत्रिकांतल्या जोड्याच एकमेकीशी जुळतात आणि बहुसंख्य म्हणजे ऐंशी टक्के जुळत नाहीतच. असे सर्वांच्याच बाबतीत होत असते. त्याप्रमाणे अनेक लोकांनी प्राजक्ताची पत्रिका त्यांच्या मुलाच्या पत्रिकेशी जुळत नसल्याचा निकाल जनूभाऊंना कळवला. 

म्युनिसिपल क्वार्टर्समधला जनूभाऊंचा पत्ता पाहूनच कांही वरपित्यांनी ते पत्र कचर्‍याच्या पेटीत टाकून दिले असेल. त्याला उत्तर देण्याची गरज त्यांना वाटली नसेल. कांही लोकांना टेलीफोन करून जनूभाऊने आठवण करून दिली, पण रांगडेपणाचा स्पर्श असलेल्या भाषेतले त्याचे बोलणे ऐकल्यानंतर त्यांनी ते संभाषण जास्त वाढवले नाही. बंगल्यात किंवा उत्तुंग गगनचुंबी इमारतीत रहात असलेल्या लोकांच्या घरी जायला त्याला संकोच वाटत होता, पण उद्या आपली मुलगी त्यांच्या घरी द्यायची असेल तर तिथे जावे लागणारच, असा विचार करून तो कांही लोकांच्या घरी जाऊन त्यांना भेटून आला. पण दर वाक्यात दोन तीन इंग्रजी शब्द आणि दर दोन तीन वाक्यात एक अख्खे इंग्रजी वाक्य असे मिश्रण असलेले त्यांचे बरेचसे बोलणे जनूभाऊच्या डोक्यावरून जात होते. त्यांच्या घरातल्या स्त्रियांनी केलेली वेषभूषा, केशभूषा व एकंदर साजश्रुंगार आणि त्यांचे मॅनर्स व एटिकेट्स सांभाळत कृत्रिमपणे बोलणे जान्हवीच्या मनात इन्फीरिएरिटी काँप्लेक्स निर्माण करत होते. त्यांना एकमेकांशी बोलता येईल असा समान विषय सापडत नव्हता. त्यामुळे त्यांच्यात सुसंवाद साधला गेला नाही. अर्थातच त्यांच्याकडून होकार येण्याची अपेक्षा धरण्यात अर्थ नव्हता. 

प्राजक्ताला प्रत्यक्ष पाहून कोणी तिला नाकारले असे कधी झाले नाही आणि दाखवल्यानंतर तिला कोणीही नकार दिलाही नसता, पण तिच्या वरसंशोधनाच्या प्रवासाची गाडी त्या स्टेशनापर्यंत गेल्याशिवाय पुढे जायला पसंतीचा हिरवा कंदील मिळणार तरी कसा? मुलीला दाखवणे किंवा मुलगा व मुलगी यांची भेट घडवून आणणे इथपर्यंतसुद्धा बोलण्यातली प्रगती होत नव्हती. दरम्यानच्या काळात प्राजक्ताची नोकरीतली घोडदौड मात्र चालू होती. प्रमोशन, इन्क्रिमेंट, बोनस, रिवॉर्ड्स वगैरेमधून तिची प्राप्ती तीन वर्षात दुपटीवर गेली. त्याबरोबर वराबद्दलच्या अपेक्षा वाढत गेल्या आणि छाननीच्या चाळणीतल्या जाळीची वीण अधिकाधिक दाट होत गेली. ज्या आप्तस्वकीयांनी उत्साहाने आधी परिचयातली दोन चार स्थळे सुचवली होती त्यांना त्यांच्या ओळखीमध्ये पहिल्यापेक्षा जास्त चांगली स्थळे मिळालीही नसती आणि मिळाली असती तरी त्यांची पहिल्यासारखीच गत झाली असती असे पहिला अनुभव पाहिल्यानंतर वाटल्यामुळे त्यांनी आणखी नवी स्थळे शोधण्यात रस घेतला नाही. वधुवर सूचक मंडळे, वर्तमानपत्रातल्या आणि इंटरनेटवरच्या जाहिराती वगैरे पाहून जनूभाऊने आपले प्रयत्न चालू ठेवले होते, पण त्यातून कांही निष्पन्न होत नव्हते. प्राजू तर रात्रंदिवस आपल्या कामातच गढून गेली असल्यासारखे दिसत होते आणि तिचे असे कांही फार मोठे वय झाले नसल्यामुळे आपल्या कमावत्या मुलीचे तातडीने लग्न करून तिची सासरी पाठवणी करण्याची जनार्दनालाही विशेष घाई वाटत नव्हती. प्राजूचे आणि अज्ञात असलेल्या संभाव्य वराचे आईवडील एकमेकांना नापसंत करत होते किंवा आकाशातले ग्रह त्यांच्या आड येत होते. तिच्या लग्नाची झालेली अनपेक्षित अशी ही कोंडी कशी फुटणार हेच कळत नव्हते.
 . . . . . . . 

भाग ४

अशातच एका दिवशी अचानक जनार्दनाचा फोन आला. तो घाईघाईने बोलला, "अरे या रविवारी कसलाही कार्यक्रम ठरवू नकोस हां, ठरला असला तरी तो रद्द कर, तुम्हाला दोघांनाही आमच्या गेट टुगेदरला यायचंय् बरं."
मला कसलाच बोध होत नव्हता. त्या दिवशी त्याच्या घरी कोणाचा वाढदिवस नव्हता की दसरा, संक्रांत यासारखा सण नव्हता. यापूर्वी जनार्दनाने अशा निमित्याने सुध्दा कधीच असे संमेलन भरवले नव्हते. कधी कधी परदेशात राहणारे पाहुणे थोडी सुटी घेऊन भारतात येतात आणि सर्व नातेवाईकांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी वेगवेगळे जाण्याइतका वेळ त्यांच्याकडे नसतो म्हणून सर्वांना एकत्र भेटण्याचा कार्यक्रम ठेवतात. जनार्दनाच्या जवळचे असे कोणीच परदेशात रहात नव्हते. मी विचार करत असतांना जनार्दन पुढे सांगत होता, "तुझी मुलं इकडे आली असतील तर त्यांनाही घेऊन ये, नसतील तरी ती येण्यासारखी असतील तर त्यांना यायला सांग. त्यांच्याही सगळ्यांशी भेटी होतील."
मी त्याला म्हंटले, "अरे हो, हे कशाबद्दल आहे ते जरा नीट सांगशील तरी, प्राजूचं लग्नबिग्न ..." मी खडा मारून पहात होतो, पण माझे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच तो म्हणाला, "हां, त्याबद्दलच आहे. तू आलास की सगळं कळेल तुला. आधी पत्ता तर लिहून घे. मला अजून खूप फोन करायचे आहेत."
मी दिसेल ते पेन हातात घेऊन समोरच्या वर्तमानपत्रावरच त्याने सांगितलेला पत्ता, तारीख आणि वेळ लिहून घेतली. तेवढ्यात त्याने फोन बंदच केला. मी त्याला फोन लावून पाहिला, पण तो सारखा एंगेज्ड येत राहिला. त्याने सांगितल्याप्रमाणे तो फोनवर एकामागून एक बोलावणी करत असणार. रात्री त्याच्या घरी कोणी फोन उचलतच नव्हते. बहुधा तो समारंभाच्या तयारीसाठी बाहेर गेला असावा आणि मुक्कामाला तिकडेच राहिला असावा असा तर्क करून मी त्याचा नाद सोडून दिला.

रविवारी त्याने दिलेल्या पत्त्यावर जाऊन पोचलो. अनोळखी भागातल्या पूर्वी कधी न ऐकलेल्या जागेचा शोध घेताघेता थोडा उशीरच झाला. तीन मजले चढून गेल्यावर तिथे तो हॉल होता. त्याच्या अंवतीभोवती दिव्याच्या किंवा फुलांच्या माळांची आरास नव्हती की दाराला तोरण नव्हते किंवा स्वागतासाठी कोणी उभे नव्हते. बाहेर कसला बोर्डही नव्हता. उघड्या दरवाजातून आत बसलेली ओळखीची माणसे दिसली तेंव्हा त्यांना पाहून आम्हीही आत गेलो. मुंबई पुणे नाशिक त्रिकोणातली बरीचशी नातेवाईक मंडळी आमच्या आधी तिथे येऊन पोचली होती. आणखी कांही लोक यायला निघाले होते. दारातून आत गेल्यावर जे समोर दिसतील त्यांना "हॅलो, हाय्, कसं काय ?" वगैरे विचारत, वडिलधारी लोकांचा चरणस्पर्श करत आणि आमच्या पाया पडणार्‍या मुलांच्या पाठीवर थाप मारून त्यांची खुशाली विचारत आम्ही हळूहळू पुढे सरकत स्टेजपाशी जाऊन पोचलो. भेटवस्तू किंवा लिफाफे हातात घेऊन अभिनंदन करायला आलेल्या लोकांच्या छोट्याशा रांगेत उभे राहून समोरचे निरीक्षण केले.

नखशिखांत साजशृंगार करून स्टेजवर उभी राहिलेली प्राजक्ता दृष्ट लागण्यासारखी सुरेख दिसत होती. तिच्या आमच्याकडच्या बाजूला उभे असलेले जनार्दन आणि जान्हवी भेटायला येणार्‍या लोकाचे हंसतमुखाने स्वागत करत होते. प्राजूच्या पलीकडे एक काळासावळा, तिच्या मानाने थोडा राकट वाटणारा पण तरतरीत दिसणारा एक युवक उभा होता. अर्थातच तो तिचा पती असणार. त्याच्या पलीकडे बरीच जागा सोडून स्टेजच्या कडेला दोन खुर्च्या मांडून त्यावर एक वयस्क जोडपे बसले होते. त्यातल्या गृहस्थाने सुटावर बो बांधला होता. अशा प्रकारच्या समारंभात मी प्रथमच बो बांधलेला पहात होतो. त्याच्या शेजारी बसलेल्या मॅडमने चक्क फ्रॉक घातला होता. तिच्या कपाळाला कुंकुवाची टिकली नव्हती की गळ्यात मंगळसूत्र नव्हते. तिथे फक्त एक टपोर्‍या मोत्यांची माळ दिसत होती. त्यांचे रंगरूप आणि चेहेरामोहरा पाहता ते त्या युवकाचे मातापिता असणार हे लक्षात येत होते. हॉलमध्ये आलेल्या लोकांकडे दुरूनच पहात ते फक्त एक दुसर्‍याशी बोलत बसले होते. 

आमच्या पुढे असलेला ग्रुप स्टेजवरून उतरायला लागल्याबरोबर आम्ही पुढे झालो. जनार्जन आणि जान्हवीने एक पाऊल पुढे येऊन आमचे स्वागत केले. त्यांचे अभिनंदन करून होताच त्याने ओळख करून दिली, "हे आमचे जावई, टॉम कार्व्हाल्लो. "मी ही "हौडीडू" म्हणत त्याच्याशी हस्तांदोलन केले, "काँग्रॅट्स" म्हणून त्या जोडप्याला "ऑल द बेस्ट विशेस" दिल्या, आम्ही येऊन गेल्याची नोंद आल्बममध्ये ठेवण्यासाठी त्यांच्यासोबत फोटो काढून घेतला आणि स्टेजवरून खाली उतरून जनार्दनाच्या सख्ख्या भावंडांच्या शेजारी जाऊन बसलो.

ती मंडळी अजून धक्क्यातून सावरलेली दिसत नव्हती आणि त्यांनाही संपूर्ण माहिती नव्हती. थोडी माहिती, थोडा तर्क, थोडा अंदाज यातून जे तुकडे कानावर पडले त्यातून मी एक सुसंगत वाटेल अशी गोष्ट गुंफली. प्राजू आणि टॉम सात आठ वर्षांपूर्वी म्हणजे दोघेही शाळेत असतांना कसल्याशा कार्यक्रमात पहिल्यांदा भेटले होते आणि त्यांची नुसती तोंडओळख झाली होती. पुढे दोघे वेगवेगळ्या कॉलेजात शिक्षणासाठी गेले आणि कोण कुठे गेले तेसुध्दा त्यांना एकमेकांना समजायचे कांही कारण नव्हते. शिक्षण संपल्यावर टॉमला थेट दुबाईला नोकरी लागली आणि तो तिकडेच रहात होता. वर्षभरापूर्वी सहज ऑर्कुटवर मित्रमैत्रिणींच्या मित्रमैत्रिणींच्या मित्रमैत्रिणींची नांवे वाचतांना त्यातल्या कोणा एकाला दुसरे नांव दिसले आणि "मला ओळखलंस का?, कांही आठवतंय् कां?" असे विचारत स्क्रॅप टाकायला सुरुवात झाली आणि "तूच ना?", "आता तुझं कसं चाललंय्?", सध्या तू कुठे आहेस?" वगैरेंमधून ते संभाषण वाढत गेले. स्क्रॅप नंतर मेल, चॅटिंग वगैरे करता करता आपण दोघे 'एकदूजेके लिये' निर्माण झालो असल्याचा साक्षात्कार होऊन त्याचे ई-लव्ह अफेअर सुरू झाले. प्राजक्ताने याबद्दल चकार शब्द न उच्चारल्यामुळे घरात किंवा तिच्या मैत्रिणींना त्याचा पत्ता लागला नाही.

ती इंजिनियरिंगला गेली तेंव्हा तिच्या अभ्यासासाठी घरी कॉम्प्यूटर आणला होता आणि नोकरीला लागल्यानंतर इंटरनेट कनेक्शन घेतले होते. घरी असतांना ती त्याच्यासमोर नेहमी बसलेली असते एवढेच तिच्या आईवडिलांना दिसत होते, पण ती इंग्रजी भाषेत काय गिटर पिटर करत असे ते त्यांच्या आकलनाच्या पलीकडे असल्यामुळे त्यांनी ते समजून घेण्याचा प्रयत्नसुध्दा कधी केला नव्हता. आठवडाभरापूर्वी टॉम भारतात आला. दोघांनी कुठे आणि केंव्हा भेटायचे हे आधी ठरवलेलेच होते, त्याप्रमाणे भेटून त्यांनी सर्व तपशील पक्का केला. टॉमला सोबत घेऊन प्राजू घरी आली आणि तिने सांगितले, "आम्ही दोघे तीन दिवसांनी चेंबूरच्या चर्चमध्ये विवाहबध्द होत आहोत. तिथून परस्पर विमानतळावर जाऊन सिंगापूरला जाऊ आणि चार दिवसांनी परत आल्यावर आठवडाभर मुंबईला हॉटेलात राहून व्हिसा, इन्शुअरन्स, बँक अकौंट्स वगैरेची कामे आटपून अमक्या तारखेला दुबईला जाणार आहोत. माझी बदली दुबईच्या ऑफीसमध्ये झाली आहे आणि दोन आठवड्यात मला तिकडे जॉइन करायचे आहे. सर्व प्रवासांची आणि हॉटेलांची रिझर्वेशने झाली आहेत. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावेत अशी आमची इच्छा आणि अपेक्षा आहे."

कुशल इंजिनियरच्या सफाईने त्यांनी एकूण एक गोष्टी विचारपूर्वक आणि पध्दतशीर रीतीने नियोजन करून केल्या होत्या. त्यात अविचार किंवा उतावळेपणा दिसत नव्हता. त्यामुळे ते त्यात बदल करतील अशी शक्यता नव्हती. त्यांना होकार देऊन आपल्या मायेचे उरले सुरले बंध जपून ठेवणेच जनार्दन आणि जान्हवी यांच्या दृष्टीने शहाणपणाचे होते. ते अशा गोष्टी नाटकसिनेमातून रोज पहात असले तरी गदिमांच्या शब्दात सांगायचे झाले तर "अतर्क्य ना झाले कांही जरी अकस्मात" अशी गोष्ट आता त्यांच्याच जीवनात घडत होती. त्यांनी त्याला विरोध केला नाही. प्राजू आणि टॉमच्या बिझी शेड्यूलमधला रविवारचा सुटीचा दिवस तेवढा आपल्यासाठी मागून घेतला.

प्राजू जन्मल्यापासूनच तिच्या लग्नाची तयारी हळूहळू सुरू झाली होती. तिच्यासाठी एकेक ग्रॅम सोन्याची खरेदी करून ते साठवले होते. ती मोठी झाल्यावर त्याचे अलंकार घडवून घेतले होते. अलीकडे तर कुठेही छानशी साडी किंवा ड्रेस दिसला, एकादी नवी संसारोपयोगी वस्तू दिसली की तिच्यासाठी घेऊन ठेवली जात होती, आपण कोणाकोणाकडे लग्नकार्याला गेलो होतो त्या सगळ्यांना आग्रहाने प्राजूच्या लग्नासाठी बोलावून धूमधडाक्याने तिचा बार उडवायचा असे मनसुबे रचले जात होते. त्यासाठी सर्व नातेवाइकांचे लेटेस्ट पत्ते आणि फोन नंबर एका वेगळ्या वहीत उतरवून काढले होते. पण लग्नसमारंभ तर हे दोघे परस्पर ठरवून मोकळे झाले होते. तिथे इतर कोणाला बोलवायला वाव नव्हता. त्यामुळे जनूभाऊंनी या संमेलनाचा घाट घातला. त्या क्षणाला जो हॉल मोकळा सापडला तो बुक करून टाकला आणि दोन दिवस धांवपळ करून बाकीची सारी जमवाजमव केली. हे पाहता ते संमेलन छानच झाले होते आणि जवळ राहणारी झाडून सगळी आप्तेष्ट मंडळीसुध्दा आली होती. आजकाल कोणी 'खानदानकी इज्जत'चा बाऊ करत नाही.

राहून राहून सर्वांना एकच प्रश्न पडत होता. प्राजक्ताच्या मित्रमैत्रिणींच्या मित्रमैत्रिणींच्या मित्रमैत्रिणींमध्ये भारतीय, हिंदू आणि मराठी मुले शेकड्यांनी असतील, त्यांना सोडून नेमका हा टॉमच कसा तिला भेटला ? त्याचप्रमाणे टॉमला त्याच्यासारखीच गोव्याची एकादी कोंकणी बोलणारी लिझ किंवा मॅग कशी सापडली नाही? कदाचित हे दोघे आपापल्या परिस्थितीच्या कोंडीत सापडल्यामुळे त्या धाग्यानेच एकमेकांत गुंतत गेले असतील आणि त्यांनी दोघांनी मिळून तिला फोडायचे ठरवले असणार! 

.. . . . . . . . (समाप्त)


Sunday, April 05, 2009

अमेरिकेतला अजिंक्य गड - कॅस्टिलो दा सॅन मार्कोस


सातारा शहराजवळ असलेला अजिंक्यतारा हा किल्ला अनेकांना माहीत असेल, पुण्याजवळील सिंहगड, कोल्हापूरजवळचा पन्हाळा आणि महाबळेश्वरला लागून असलेला प्रतापगड हे सुप्रसिध्द किल्ले आहेत. हे सारे किल्ले उंच पहाडांच्या माथ्यावर आहेत आणि तटबंदीने वेढलेले असल्यामुळे त्यांच्या मुख्य दरवाजातूनच त्यात प्रवेश करता येत असे. या प्रकारच्या एकाद्या किल्ल्यावर कितीही मोठ्या फौजेने हल्ला चढवला तरी त्यातल्या सगळ्याच सैनिकांना दुर्गम वाटेने चढण चढून एकसाथ वरपर्यंत पोचणे शक्य नसे, अवजड तोफा वाहून नेणे तर त्याहूनही कठीण असे आणि खालून वर येत असलेले सैन्य तटबंदी आणि बुरुजांवर तयारीत असलेल्या पहारेकर्‍यांच्या मार्‍याच्या टप्प्यात असल्यामुळे त्याची अपरिमित हानी होत असे. त्याचा दरवाजा आंतून बंद केल्यानंतर हत्तीच्या धडकेनेसुध्दा मोडणार नाही इतका तो बळकट असे. किल्ल्यात राहणार्‍या लोकांना दीर्घ काळ पुरेल इतका अन्नधान्याचा साठा त्याच्या कोठारात भरलेला असे. संरक्षणाची अशी सर्व तरतूद केलेली असल्यामुळे सरळमार्गाने चढाई करून तो गड जिंकून घेणे जिंकणे अवघडच असे. अशा प्रकारे हे बहुतेक सर्वच किल्ले आपापल्या परीने अजिंक्य होते. किल्लेदाराशी गोड बोलून, त्याला आमीष किंवा धाक दाखवून, त्याच्याशी फंदफितुरी, दगाबाजी करून, मैदानातल्या युध्दानंतर तह करून अशा कांही वेगळ्या मार्गांनी विशेष मोठी लढाई न करताच या किल्ल्यांचे हस्तांतरण होत असे. नरवीर तानाजी मालुसरे आणि त्याच्या शूर मावळ्यांनी रात्रीच्या काळोखात घोरपड आणि दोरखंड यांच्या सहाय्याने कोंडाणा किल्ल्यावर चढून तिथल्या बेसावध असलेल्या पहारेकर्‍यांवर अचानक हल्ला चढवला आणि पराक्रमाची शर्थ करून तो जिंकून घेतला. या मोहिमेत "गड आला पण सिंह गेला" असे उद्गार छत्रपतींनी काढले आणि त्या किल्ल्याचे नांव सिंहगड असे पडले. अशा घडना क्वचितच घडतात आणि त्यामुळे त्याची इतिहासात खास नोंद केली जाते.

गेली तीन शतके अजिंक्य राहिलेला अमेरिकेतला असा एक किल्ला मी नुकताच पाहिला. फ्लॉरिडा राज्यातील सेंट ऑगस्टिन या ठिकाणी हा किल्ला आहे. कॅस्टिलो दा सॅन मार्कोस असे त्याचे नांव आहे. पुण्याच्या शनिवारवाड्याहून किंवा मराठ्यांच्या एकाद्या सरदार जहागिरदाराच्या गढीपेक्षा आकाराने तो थोडा मोठा असेल. तो दुर्गम अशा पहाडावर बांधलेला नसून साध्यासुध्या शांत अशा समुद्रकिनार्‍यावर आहे. दोन अडीच पुरुष उंच असलेली त्याची तटबंदी कमांडोंचे प्रशिक्षण घेतलेले जवान टणाटण चढून जातील असे वाटते. अशा प्रकारचा हा किल्ला इतका काळ अभेद्य कसा राहिला असेल याचे आश्चर्य वाटेल. त्यासाठी त्याचा इतिहास व भूगोल पहावा लागेल.

हिंदुस्थानाचा शोध घेण्यासाठी पश्चिम दिशेने युरोपमधून निघालेला कोलंबस इसवी सन १४९२ मध्ये अॅटलांटिक समुद्रातल्या बहामा बेटावर जाऊन पोचला आणि आपण हिंदुस्थानला जाण्याचा जवळचा मार्ग शोधून काढला अशी खुषीची गाजरे खात परत गेला. हा एक वेगळाच भूभाग असल्याचे त्याच्या मागून आलेल्या लोकांच्या लक्षात आले आणि हा नवा प्रदेश जिंकून घेण्याच्या उद्देशाने युरोपातील साहसी लोकांच्या झुंडीच्या झुंडी तिकडे लोटल्या. त्या सुध्दा प्रथम इतर कॅरिबियन बेटांवर पोचल्या. क्रिकेटच्या जगात वेस्ट इंडीज या नांवाने प्रसिध्द झालेली ही बेटे उत्तर अमेरिकेच्या आग्नेय भागातल्या फ्लॉरिडा या राज्यापासून जवळ आहेत. त्यामुळे युरोपियन लोकांनी थोड्याच काळात अमेरिका खंडाच्या या भागात पहिले पाऊल ठेवले आणि त्यानंतर ते येतच राहिले.

शिकारी आणि शेतकरी यांच्या दरम्यानच्या अवस्थेत जेमतेम उदरनिर्वाह करत जगणारे आदिवासी त्या काळात या भागात तुरळक वस्ती करून रहात होते. याउलट अंगापिंडाने दणकट आणि युध्दकौशल्यात तरबेज असे बेदरकार वृत्तीचे महत्वाकांक्षी लोक युरोपातून तिकडे जात असत. समुद्रातून अचानकपणे प्रकट झालेल्या या लोकांना पाहूनच आधी स्थानिक लोक हतबुध्द झाले होते. घोड्यावर स्वार होऊन हातातल्या समशेरी पाजळत किंवा बंदुकांचे बार काढत ते चालून आल्यावर तिथल्या दुर्बळ, निःशस्त्र आणि असंघटित लोकांना त्यांचा प्रतिकार करणे शक्यच नव्हते. त्यातल्या कांही जणांची कत्तल झाली, जेवढे जीवंतपणे शत्रूच्या हातात सांपडले त्यांना त्यांचे गुलाम बनावे लागले आणि उरलेले लोक आपला जीव वाचवण्यासाठी रानावनात पळून गेले. त्यांच्यापाशी लुटण्यासारखे फारसे कांही नव्हतेच. तिथल्या जमीनीचा जेवढा भाग ज्याला लुबाडता आला तेवढा त्याने आपल्या ताब्यात घेतला आणि जितक्या भागाचे रक्षण करणे ज्याला शक्य होते तेवढा त्याच्या ताब्यात राहिला. युरोपियन लोकांच्या टोळ्या एकामागोमाग एक येत गेल्या आणि अमेरिकेच्या अंतर्गत भागात पसरत गेल्या.

फ्लॉरिडा या भागात सर्वात आधी स्पॅनिश लोक आले आणि त्यांनी आपली वसाहत स्थापन केली. सन १५६५ मध्ये स्थापन केले गेलेले सेंट ऑगस्टिन हे अमेरिकेच्या आधुनिक काळातल्या इतिहासातले पहिले शहर आहे. त्यानंतर फ्रेंच आणि ब्रिटिश लोकही अमेरिकेत आले. या लोकांची आपापसात युध्दे होत राहिली. फ्लॉरिडा भागात मुख्यतः स्पॅनिश लोकांची वस्ती असल्यामुळे ते पुनःपुन्हा सत्तेवर येत राहिले. आपल्या वसाहतीच्या संरक्षणासाठी सन १६७२ ते १६९५ या काळात स्पॅनिश लोकांनी सेंट ऑगस्टिन या ठिकाणी हा मजबूत किल्ला बांधला. त्याच्या सर्व बाजूंनी खंदक खणलेले आहेत. संरक्षणासाठी त्यात पाणी सोडत असत. कदाचित सुसरीसुध्दा सोडून ठेवल्या असतील. तसेच त्याच्या बुरुजांवर मध्यम आकाराच्या अनेक तोफा बसवल्या होत्या. आजूबाजूचा प्रदेश स्पेनच्याच ताब्यात होता त्यामुळे जमीनीवरून कोणाच्या आक्रमणाची एवढी भीती नव्हती. पण समुद्रमार्गाने येऊन हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न ब्रिटीश सैनिकांनी केले. त्यात दोन वेळा ते किल्ल्यापाशी येऊन पोचले आणि त्याला वेढा देऊन बसले होते. पण किल्ल्याची मजबूत तटबंदी त्यांना भेदता आली नाही. कॅरीबियन बेटांवरून स्पॅनिश लोकांची कुमक आली आणि त्यांनी ब्रिटीशांना पळवून लावले.

ब्रिटन आणि स्पेन यांच्यात सागरी युध्दानंतर दोन वेळा पॅरिस येथे तह झाले. अमेरिका, आफ्रिका आणि आशिया खंडांमधील त्यांच्या साम्राज्यातील भूभागांची फेरवाटणी या तहांद्वारे करण्यात आली. त्यातल्या सन १७६३ साली झालेल्या पहिल्या तहात या किल्ल्यासह हा फ्लॉरिडाचा भाग ब्रिटनला देण्यात आला आणि इथले कांही स्पॅनिश लोक क्यूबात निघून गेले. त्यानंतर लवकरच अमेरिकेत क्रांतीयुध्द सुरू झाले. त्यावेळेस हा किल्ला हे या भागातले ब्रिटीशांचे मोठे ठाणे बनवायचा प्रयत्न ब्रिटीशांनी केला, पण आजूबाजूच्या स्पॅनिश लोकांनी उठाव करून त्यांची शक्ती किल्ल्यापुरत्याच मर्यादेत ठेवली. त्यानंतर सन १७८४ साली झालेल्या दुस-या पॅरिसच्या तहाप्रमाणे फ्लॉरिडा विभाग पुन्हा एकदा स्पेनच्या ताब्यात आला. अमेरिकेतील स्वतंत्र झालेली इतर संस्थाने आणि स्पेनच्या अधिपत्याखालील फ्लॉरिडा यांच्यात कुरबूर चालत राहिली. अखेर १८१९ साली स्पेनने फ्लॉरिडाच्या अमेरिकेत विलीनीकरणाला मान्यता दिली. अशा प्रकारे वेळोवेळी दूर कुठे तरी झालेल्या तहांमुळे या किल्याचे हस्तांतरण होत गेले. प्रत्यक्ष लढाईचे प्रसंग फारसे कधी आलेच नाहीत. जेंव्हा आले तेंव्हा हा किल्ला अभेद्य राहिला.

Saturday, April 04, 2009

पेरूचा पापा ते मोलाचा कावा

मुंबईत राहिलेल्या माझ्या पिढीतल्या बहुतेक मध्यमवर्गीय मराठी माणसांना 'पेरूचा पापा' नक्की माहीत असेल, कदाचित ते सुध्दा माझ्याप्रमाणे रोज सकाळी तो घेऊनच ऑफीससाठी प्रस्थान करत आले असणार. प्रख्यात कथालेखक व.पु.काळे किंवा वि.आ.बुवा यांनी आधी 'पेरूचा पापा' शोधून काढला आणि नंतर तो घरोघरी पोचला असे मला परवाच समजले. तीस पस्तीस वर्षांपूर्वी मी या दोन्ही लेखकांच्या कथा शोधून शोधून वाचत असे, त्यामुळे हा शोध ज्या कथेतून जगासमोर आला ती सुध्दा मी वाचली असणारच, पण या दोन शब्दांचा पुढे मराठी भाषेतला वाक्प्रचार होणार आहे एवढे ओळखण्याचा द्रष्टेपणा कांही माझ्या अंगात नव्हता, त्यामुळे 'पेरूचा पापा' घेऊन घराबाहेर पडलेल्या त्या कथानायकाचे पुढे काय झाले ते कांही मला आता आठवत नाही. हा शब्दप्रयोग कुठून निघून माझ्या तोंडी येऊन बसला यापेक्षा तो कित्येक वर्षे तिथे मुक्काम करून होता हे जास्त महत्वाचे आहे.
त्या काळातील इतर मध्यमवर्गीयांप्रमाणे मी सुध्दा एका दूरच्या उपनगरात रहात होतो आणि रोज सकाळी सात त्रेपन की सत्तावन अशी कोणतीशी एक ठराविक लोकल पकडून दक्षिण मुंबईत असलेल्या ऑफीसला जात होतो. ती गाडी चुकू नये यासाठी घरापासून धांवाधांव करावी लागत असे. त्या गडबडीत एकादी महत्वाची वस्तू विसरून घरी राहिली तर सगळा गोंधळ व्हायचा. तो टाळण्यासाठी त्या सर्व वस्तूंना एकत्र बांधणारे 'पेरूचा पापा' हे दिव्य सूत्र बहुधा व.पुंनी, बुवांनी, कदाचित तिस-या कोणा लेखकाने, मराठी माणसाला दिले होते. त्या अत्यावश्यक वस्तू होत्या पेन, रुमाल, चावी, पास आणि पाकिट.
मी नोकरीला लागलो त्या सुमारास बॉल पॉइंट पेने बाजारात आली होती, पण ती सुमार दर्जाची असायची. ज्या वेगाने आपल्याला लिहावे असे वाटेल त्या वेगाने त्यातली शाई खाली उतरत नसे आणि ते खिशात ठेवले असतांना व कसलीही गरज नसतांना ती खाली उतरून शर्टाला जो डाग पाडत असे तो कोणत्याही साबणाने निघत नसे. शिवाय 'वापर करा आणि फेकून द्या' असे सुचवणारी आजकालची संस्कृती त्या काळात अजून प्रचलित झाली नव्हती. त्यामुळे 'टाकाऊ' गोष्टी विकत घेण्यापेक्षा 'टिकाऊ' वस्तू आणण्याकडे सर्वांचा जास्त कल असे. त्या मानाने पाहता एक चांगले फाउंटन पेन एकदा घेतले की शंभर दीडशे वेळा त्यात शाई भरून आणि दोन तीन वेळा त्याचे निब बदलून ते सहज दोन तीन वर्षे जात असे. कांही कांही लोकांनी तर त्यांच्या बाबांची आठवण म्हणून त्यांचे जुने परदेशी बनावटीचे पार्कर किंवा शेफर पेन वीस वीस वर्षे जपून ते वापरात ठेवलेले मी पाहिले आहे. फाउंटन पेनचे एक वैशिष्ट्य असे होते की रोजच्या वापरात असले तरच ते सुरळीतपणे चालत असे. न वापरता दोन तीन दिवस जरी पडून राहिले तर त्याची शाई निबात सुकून ते बंद पडण्याची भीती असायची. यामुळे घरात आणि ऑफीसात वेगवेगळी पेने ठेवण्यापेक्षा एकच आवडते पेन नेहमी सोबत ठेवले जाई. तर सांगायचे तात्पर्य असे की त्या काळात ऑफीसमध्ये काम करणा-या लोकांसाठी पेन ही घरातून निघतांना आठवणीने घेऊन जाण्याची एक अत्यावश्यक गोष्ट होती.
मुंबईच्या लोकांना रुमालाचे उपयोग सांगायची गरजच नाही. तो डोळ्यांना लावण्याचे किंवा त्याच्या आड आपले हंसू लपवण्याचे प्रसंग पुरुषांवर सहसा येत नाहीत, पण बारा महिने सदोदित येत राहणारा घाम टिपण्यासाठी त्याची गरज पडतेच. शिवाय हात किंवा तोंड धुतल्यानंतर तिथे नॅपकिन वा टॉवेल नसेल तर हाताशी असलेला हातरुमाल उपयोगी पडतो. जेंव्हा प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा शोध लागलेला नव्हता त्या काळात ऑफीसात जातां जातां किंवा घरी परततांना अचानक वाटेत कांही किरकोळ वस्तू विकत घ्यायची बुध्दी झाली तर तिच्या कागदात गुंडाळलेल्या पुड्याला रुमालाचा आधार द्यावा लागत असे. शिवाय फार कडक ऊन असले तर डोक्यावर ठेवायला आणि जमीनीवर किंवा कट्ट्यावर फतकल मारून बसायचे असेल तर खाली पसरायला अशा अनेक प्रकाराने रुमालाचा उपयोग होत असे. त्यामुळे असा बहुगुणी रुमाल खिशात ठेवणे आवश्यकच असायचे.
मी मुंबईला आल्यापासून पुलंच्या शब्दात 'बंद दरवाज्याच्या संस्कृतीत' म्हणजे फ्लॅटमध्येच रहात आलो आहे. त्यामुळे दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकण्यापूर्वी त्याची लॅच की खिशात ठेवणे किती आवश्यक असायचे ते मुद्दाम सांगायची गरज नाही. ऑफीसमधल्या गोपनीय बाबींची चिटोरी कुलुपात बंद ठेवावी लागत. त्यांची चावी घरी राहून गेली तर ऑफीसातले काम अडत असे आणि ती गोष्ट चार जाहीर होत असे. त्यामुळे त्यांच्या किल्ल्या खिशात हव्यातच. लोकल रेल्वेने रोज प्रवास करण्यासाठी पास हवाच आणि पैशाच्या पाकिटाशिवाय दिवसभर बाहेर रहायचे म्हणजे जरा कठीणच. 'पेरूचा पापा'हा सोपा मंत्र या पांचही गोष्टी आठवणीने खिशात ठेवायला चांगला होता.
पुढे त-हेत-हेच्या बॉलपेन आणि फायबर टिप पेनांचा महापूर आला आणि फाउंटन पेन कालबाह्य झाले. माझे ऑफीस घरापासून पांच मिनिटे पायी चालत जाण्याच्या अंतरावर आले आणि त्या वाटेवर एकही दुकान नव्हते. त्यामुळे पास नाहीसा झाला आणि पाकिटाची गरज कमी झाली. रुमाल व चावी एवढ्या दोनच गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी सूत्राची गरज राहिली नाही आणि त्यातून त्यातली एकादी विसरून राहून गेली तरी वाटेतून केंव्हाही परत फिरून त्या घेऊन जाणे शक्य होते. त्यामुळे 'पेरूचा पापा' मागे पडला.

ऑफीसच्या कामासाठी मला वरचेवर परगांवी जावे लागत असे. मोबाईलचा प्रसार झाल्यानंतर आपल्या जगाबरोबर 'कनेक्टेड' राहण्यासाठी मोबाईल फोन खिशात बाळगणे आवश्यक झाले. बाहेरगांवी हॉटेलची बिले वगैरे देण्यासाठी क्रेडिट कार्ड सोयीचे होते आणि आपली ओळख दाखवण्यासाठी आयडेंटिटी कार्ड जवळ असणे अत्यावश्यक असायचे त्यामुळे 'पेरूचा पापा' या सूत्रात थोडा बदल करून मी माझ्या उपयोगासाठी त्याला 'मोरूचा काका' असे रूप दिले. पण मी प्रख्यात लेखक वगैरे नसल्यामुळे त्याचा वाक्प्रचार कांही झाला नाही.
मागच्या वर्षी मी कांही काळ अमेरिकेत गेलो होतो. तिकडची राहणी आपल्यापेक्षा थोडी वेगळी आहे. पेपरलेस ऑफीसे झाल्यापासून पेनला भाव राहिला नाही. मोबाईल मात्र आवश्यक असतो. लोकलचा पास फक्त मोठ्या महानगरातल्या थोड्या लोकांना लागत असेल. बहुतेक लोक आपल्या कारने ऑफीसला जातात. त्यासाठी ड्रायव्हिंग लायसेन्स सोबत ठेवणे अनिवार्य असते. शनीशिंगणापूर सोडल्यास जगभर 'दार तिथे कुलुप' हे असते, त्यामुळे त्याच्या किल्लीचे आकार किंवा स्वरूप बदलले तरी तिची गरज पडतेच. आंगठ्यावरील रेषा वाचून किंवा "खुल जा सिमसिम" यासारखा सांकेतिक शब्द ऐकून उघडणारे दरवाजे अस्तित्वात आले असले तरी ते घरोघरी किंवा ऑफीसोऑफीसी अजून पोचायचे आहेत. रोख पैशातले व्यवहार जवळ जवळ संपुष्टात येऊन क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डने सारे व्यवहार व्हायला लागले आहेत. रुमालाचा वापर कमी होऊन त्याच्या जागी वाइप्स आल्या आहेत. या गोष्टींची आद्याक्षरे घेऊन 'मोलाचा कावा' असा नवा मंत्र तयार करावा की Cellphone, Licence, I card, Credit card आणि Key यांची इंग्रजी मुळाक्षरे घेऊन त्याचे क्लिक (CLICK) बनवावे असा विचार मी सध्या करतो आहे.

Thursday, April 02, 2009

राम जन्मला ग सखी ....



आज रामनवमी आहे. देशभरात आणि आता परदेशातही जिथे भारतीय लोक असतील तिथे रामजन्माचा उत्सव साजरा केला जात आहे. सुंठवडा वगैरे वाटायची पध्दत राहिली नसली तरी पेढे वाटून आनंद व्यक्त होईल. त्या निमित्याने थोडा रामनामाचा जप केला जाईल, रामरक्षेचे पठण होईल, कोणाला येत असेल तर रामाची आरती गायली जाईल. रामाची गाणी तर ऐकायला नक्की मिळतील. टीव्हीवर त्याची क्षणचित्रे आपल्याला दिसतील.

प्रभू रामचंद्राचा विलक्षण प्रभाव आपल्या नकळत आपल्या जीवनावर पडलेला असतो. श्रीराम, रामचंद्र, रघुनाथ, राघव, सीताराम, राजाराम, जयराम यासारखी त्याची अनेक नांवे आपल्या ओळखीची असतात. त्या नांवाच्या विभूती इतिहासात होऊन गेल्या, गेल्या शेदोनशे वर्षात ज्यांनी विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आणि अजून करताहेत त्या प्रसिध्द व्यक्तींमध्ये हे नांव दिसते, यातील प्रत्येक नांवाची निदान एक तरी व्यक्ती माझ्या व्यक्तिगत परिचयाची आहे, तशीच सगळ्यांच्याच ओळखीची असेल. माझ्या आधीच्या
पिढीपासून माझ्या नंतरच्या पिढीपर्यंत सगळीकडे मला हे नांव पहायला मिळते. रामाप्रमाणेच आपल्या मुलाने पराक्रमी, सत्यवचनी आणि आदर्शवादी व्हावे अशी इच्छा त्याचे नांव ठेवतांना आईवडिलांची असेल. त्यालाही रामाप्रमाणे वनवास मिळावा असे मुळीसुध्दा वाटले नसेल. पण दुर्दैवाने वाईट दिवस आलेच तर "प्रभू रामालासुध्दा वनवास भोगावा लागलाच ना?" असे म्हणून त्याच्या चटक्यांचा थोडा सौम्य होतो.

साहित्यामध्ये आणि विशेषतः काव्यामध्ये रामाची गोष्ट कधीच जुनी झाली नाही. तिच्या अनेक पैलूंचे प्रत्यक्ष दर्शन तर घडतेच, शिवाय वेगवेगळ्या संदर्भात त्यातील घटनांचा उल्लेख येतो, त्या प्रसंगी त्यातली पात्रे कशी वागली याची उदाहरणे दिली जातात. भजन, भक्तीगीत आदी सुगम संगीताच्या प्रकारात श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना उद्देशून किंवा त्यांचे गुणगान करणा-या अनंत रचना आहेत आणि नव्या नव्या रचना होत असतात.
रेडिओ आणि टेलीव्हिजन या दोन्ही आधुनिक काळातल्या प्रसारमाध्यमांवर काही काळापुरते 'राम'राज्य निर्माण झाले होते. जेंव्हा आकाशवाणीवर गीतरामायणाचे साप्ताहिक प्रक्षेपण सुरू झाले तेंव्हा या एका कार्यक्रमाने मराठी जगतात प्रचंड खळबळ उडवून दिली होती. बाकीची सारी कामे बाजूला सारून किंवा आधी आटपून घेऊन या कार्यक्रमाची वेळ झाली की घरातली सगळी माणसे रेडिओच्या भोवती
गोळा होऊन बसत आणि कानात प्राण ऐकून ती गाणी ऐकत असत. इतकी अफाट लोकप्रियता दुस-या कोणत्याही गीतमालिकेला मिळाल्याचे उदाहरण मला माहीत नाही.

रामानंद सागर यांनी दूरदर्शनवर दर रविवारी सकाळी रामायण दाखवायला सुरुवात केल्यानंतर देशभर हेच चित्र निर्माण झाले होते. कांही झाले तरी रामायणाची वेळ साधायचीच अशा निर्धाराने बाकीची कामे संपवली किंवा टाळली जात. मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरातल्या गर्दीच्या रस्त्यांवर रामायणाच्या प्रक्षेपणाच्या वेळेत कर्फ्यू असल्यासारखा शुकशुकाट दिसायचा. त्या काळातल्या दोन मजेदार घटना मला आठवतात.

एका मरहूम खॉंसाहेबांच्या नांवाने चाललेल्या संगीत महोत्सवाच्या शेवटच्या पर्वात दुस-या एका तत्कालीन प्रसिध्द खॉंसाहेबांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम ठेवला होता. आज रामायण बुडणार या विचाराने श्रोतेमंडळी हळहळत होती आणि चुळबुळ करत होती. पण कार्यक्रमाची वेळ होऊन गेली तरी मुख्य गायकाचाच पत्ता नव्हता. ट्रॅफिक जॅमचा प्रश्नही नव्हता. अखेर रामायणाची वेळ संपल्यावर पांच मिनिटात खॉंसाहेब आले. त्यांनी विनम्रपणे दिलगिरी व्यक्त करून उपस्थित श्रोत्यांची माफी मागितली. "मी इथपर्यंत वेळेपूर्वीच येऊन पोचलो होतो, पण वेळ काढण्यासाठी जवळ राहणाऱ्या मित्राच्या घरी बसलो होतो. त्यानंतर टीव्हीवरील रामायण बुडवून मी इकडे कसा येऊ शकणार?" असे उद्गार त्यांनी काढले. आपल्या गायनातून त्यांनी सगळी कसर भरून काढली हे सांगायला नकोच.

दुसरा प्रसंग माझ्या नात्यातल्या एका लग्नाचा आहे. सकाळचा नाश्ता आणि मुहूर्ताच्या अक्षता टाकून झाल्यानंतर जेवणाला वेळ होता. जवळ राहणारी स्थानिक मंडळी आपापल्या घरी जाऊन रामायण पाहू शकत होती. बाहेरगांवाहून आलेल्या पाहुण्यांनी काय करायचे? वरपक्षानेही त्यात इंटरेस्ट दाखवल्यामुळे धावपळ करून एक टीव्हीचा मोठा संच कार्यालयात आणला गेला आणि कसा ते कुणास ठाऊक, त्याला तात्पुरता एंटेना जोडून रामायणाचे सार्वजनिक पाहणे सुरू झाले. थोड्या वेळानंतर कोणाच्या तरी असे लक्षात आले की सगळी स्वयंपाकी मंडळीसुध्दा त्यासाठी हॉलमध्ये येऊन बसली आहेत. त्यांना बाहेर पिटाळणे सुरू झाले. पण इतर प्रेक्षकांनीच त्यांची बाजू घेत "आम्हाला जेवणाला उशीर झाला तरी चालेल. त्यांना रामायण पाहू द्या." असे सांगितले. त्यांनी नाराज होऊन स्वयंपाक बिघडवू नये अशा विचाराने त्यांना रामायण पाहू दिलेही गेले.

गीतरामायणाला पन्नास वर्षाहून अधिक काळ लोटला असला तरी त्यातली कांही गाणी निरनिराळ्या कार्यक्रमातून अजून ऐकू येतात आणि मुख्य म्हणजे नव्या पिढीतल्या मुलांनासुध्दा ती गावीशी व ऐकावीशी वाटतात. उघड्या मैदानात नाचगाण्याचे कार्यक्रम होणे आता सामान्य झाले आहे, पण जेंव्हा गीतरामायणाला पंचवीस वर्षे झाली तेंव्हा  तसे नव्हते. तरीसुध्दा स्व.सुधीर फडके यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या विस्तृत पटांगणात हा रौप्यमहोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला होता. बाबूजींचे गायन ऐकायला दूरदूरहून आलेल्या श्रोत्यांनी ते पटांगण रोज तुडुंब भरत होते. त्यांचे दिव्य गायन प्रत्यक्ष ऐकण्याचे आणि एवढा मोठा जनसागर पाहण्याचे भाग्य मला प्रथमच लाभले.
आज रामनवमीच्या निमित्याने स्व. ग.दि.माडगूळकरांच्या शब्दात रामजन्माचा सोहळा खाली देत आहे.

चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमि ही तिथी ।
गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती !
दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला ?
राम जन्मला ग सखी राम जन्मला ।।

कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें ।
दिपुन जाय माय स्वतः पुत्र-दर्शनें ।
ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला ।।

राजगृहीं येइ नवी सौख्य-पर्वणी ।
पान्हावुन हंबरल्या धेनु अंगणीं ।
दुंदुभिचा नाद तोंच धुंद कोंदला ।।

पेंगुळल्या आतपांत जागत्या कळ्या ।
’काय काय’ करित पुन्हां उमलल्या खुळ्या ।
उच्चरवें वायु त्यांस हंसुन बोलला ।।

वार्ता ही सुखद जधीं पोंचली जनीं ।
गेहांतुन राजपथीं धावले कुणी ।
युवतींचा संघ एक गात चालला ।।

पुष्पांजलि फेंकि कुणी, कोणी भूषणें ।
हास्याने लोपविले शब्द, भाषणें ।
वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला ।।

वीणारव नूपुरांत पार लोपले ।
कर्ण्याचे कंठ त्यांत अधिक तापले ।
बावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला ।।

दिग्गजही हलुन जरा चित्र पाहती ।
गगनांतुन आज नवे रंग पोहती ।
मोत्यांचा चूर नभीं भरुन राहिला ।।

बुडुनि जाय नगर सर्व नृत्यगायनीं ।
सूर, रंग, ताल यांत मग्न मेदिनी ।
डोलतसे तीहि, जरा, शेष डोलला ।।
राम जन्मला ग सखी राम जन्मला ।।

हे गाणे श्रीधर फडके यांच्या मधुर आवाजात इथे
https://www.youtube.com/watch?v=Brba-XZO8rI

पावाच्या ५५५ पदार्थांची पाककृती


अलीकडे आंतर्जालावर रोज येणा-या पाककृतींचा लोंढा पाहून खाद्यसंस्कृतीबद्दल मलाही जरा जास्तच आपुलकी वाटायला लागली आहे. त्यावर निर्माण होत असलेल्या साहित्यात आपणही अल्पशी भर घालावी असे वाटल्यामुळे हा लेख लिहिला आहे. तेच ते पुन्हा पुन्हा लिहिण्यात वाया जाणारा वेळ वाचवण्यासाठी 'गागरमें सागर' म्हणतात ना तसे पांचशे पंचावन्न पदार्थ एका पोटळीत बांधून सादर करायचे ठरवले आहे.
साहित्य:

१)पावरोटीची लादी किंवा ठोकळा किंवा स्लाइस्ड ब्रेड (पांढरी किंवा तपकिरी रंगाची). (बनपाव, फ्रूट ब्रेड, मिल्क ब्रेड, डोनट आदी गोड प्रकार 'पावाची पाचशे पंचावन्न पक्वान्ने' या प्रस्तावित लेखासाठी राखून ठेवले आहेत. ते या कृतीसाठी घेऊ नयेत.)
एकंदर पर्याय: ४
२) स्निस्ग्ध पदार्थ : लोणी, साय, पाश्चराइज्ड बटर, पीनट बटर, चीज स्प्रेड, चीज वगैरेपैकी एक वा दोन
एकंदर पर्याय :६
३) भाज्या: काकडी, गाजर, मुळा, बीटरूट, कांदा, बटाटा, टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना, भोपळी मिरची इत्यादी
एकंदर पर्याय: १०
५) चटण्या: ओले किंवा सुके खोबरे, शेंगदाणे, तीळ, कारळे, लसूण, कोथिंबीर, पुदिना, भोपळ्याची साल, दोडक्याच्या इत्यादीपासून तयार केलेल्या
एकंदर पर्याय: ८ चे वर
६)अवांतर: टोमॅटो सॉस किंवा केचप, हॉट अँड स्वीट, स्वीट अँड सॉवर, चिली गार्लिक इत्यादी बाटलीतली पातळ किंवा दाट द्रव्ये, चवीला तिखट, मीठ, निरपूड, साखर
एकंदर पर्याय: ५ पेक्षा अधिक

कृती:
पावाला आडवा छेद देऊन त्याचे काप करावेत. आधीच कापून मिळालेल्या स्लाइस्ड ब्रेडच्या कडा व पाठ वाटल्यास कापून बाजूला ठेवावेत. त्यांचा चुरा करून त्यापासून इतर स्वादिष्ट पदार्थ बनवता येतील. पावरोटीच्या लादीचे पाठपोट कापू नयेत. नाहीतर "तेलही गेलं, तूपही गेलं आणि धुपाटणे हांती आलं" अशी अवस्था होईल.
पावाच्या कापाच्या एका अंगाला आपल्याला हवा असेल आणि उपलब्ध असेल त्या स्निग्ध पदार्थाचा लेप बोथट सुरीने लावावा. चीजच्या लाट्या घेतल्या किंवा ते किसून घेतले तर पसरवण्यास सोपे जाईल. लेपाच्या थराची जाडी आपल्या आवडीच्या सम प्रमाणात आणि कोलेस्टेरॉलबद्दल मनात वाटत असलेल्या भीतीच्या व्यस्त प्रमाणात ठेवावी.
भाज्यांचे पातळ काप करावेत किंवा त्या बारीक चिरून किंवा किसून घ्याव्यात. कोबी, गाजर व बीटरूट वाटल्यास वाफेवर किंचित नरम करून घ्यावेत. मंद आंचेवर तेलात परतून घेतल्यास त्यांना, विशेषतः कांद्याला, अधिक चव येते. बटाटा आधी उकडून घेऊन नंतर सोलून त्याचे काप करावेत. उलट क्रमाने केल्यास वेळ आणि जिन्नस या दोन्हीचा अपव्यय होईल.
स्निग्ध पदार्थाचा लेप दिलेल्या बाजूवर हव्या त्या चटणीचा पातळसा थर द्यावा किंवा पाहिजे ती पेस्ट पसरावी. त्यावर हव्या तेवढ्या भाज्यांचे काप, कीस किंवा चुरा पसरावा. थराची जाडी आपल्या आवडीच्या सम प्रमाणात आणि कोलेस्टेरॉलबद्दल वाटत असलेल्या भीतीच्याही सम प्रमाणातच ठेवावी. त्यावर चवीनुसार तिखट, मीठ, मिरपूड, साखर वगैरे बारीक चिमटीने शिंपडावी. शिंपडण्यासाठी खास छिद्रयुक्त झाकणे असलेल्या छोट्या बाटल्यासुद्धा मिळतात. त्यांचा उपयोग करता येईल. पावाचा दुसरा काप त्यावर
ठेवून चारी बाजूंनी एकदम हलकेसे दाबावे.
हा पदार्थ वाटल्यास थंड गार खावा, वाटल्यास तव्यावर किंवा हिंजच्या टोस्टरमध्ये भाजून घ्यावा. पॉपअप टोस्टरमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करू नये. वाटल्यास पहिल्या पायरीनंतर लगेच पावाचे काप त्यात वेगळे भाजून घ्यावेत आणि त्यानंतरच्या कृती कराव्यात.

ही सगळीच साधी सॅँडविचेस आहेत असे कोणी म्हणेल, पण प्रत्येक कॉंबिनेशनची रुची वेगळी आहे हे खवैयांना माहीत असतेच, इतरांनी ध्यानात घ्यावे. वर दिलेल्या साहित्याच्या यादीतील प्रत्येक वस्तूला अनेक पर्याय आहेत, तसेच कृतीमधील प्रत्येक पायरीवर
कांही पर्याय आहेत. यांच्या परम्यूटेशन्स आणि कॉंबिनेशन्स करून एकंदर किती प्रकारचे पदार्थ बनू शकतील त्याचे गणीत मांडण्याचे 'फॅक्टोरियल'युक्त फॉर्म्यूले मराठी भाषेत मला लिहिता येणार नाहीत. पण संख्याशास्त्राच्या नियमाप्रमाणे सर्व पर्यायांचा साधा गुणाकार करून येणारी संख्या (४x६x१०x८x५xअनेक) देखील पाचशे पंचावनपेक्षा अनेकपटीने मोठी होईल. साहित्याची उपलब्धता, वैयक्तिक आवड निवड वगैरेंचा विचार करून तिच्यात काटछाट केली तरी पाचशे पंचावन्न वेगवेगळ्या चवी असलेले पदार्थ त्यातून बनू शकतीलच.
मांसाहार वर्ज्य नसल्यास उकडलेले किंवा तळलेले अंडे, शिजवलेला खिमा, माशाचे किंवा चिकनचे शिजवलेले, भाजलेले किंवा तळलेले हाडविरहीत बारीक तुकडे भाजीच्या ऐवजी त्यात घालता येतील. तेही कमी पडले तर वडा पाव, उसळ पाव, मिसळ पाव, बर्गर वगैरेंचे अनेक प्रकार घ्यावेत. हे सगळे प्रकार स्वतःच करून पहावेत असा माझा मुळीच आग्रह नाही. ते जिथे कुठे चांगले मिळत असतील तिथे जाऊन खाण्यास कांहीच हरकत नसावी. तरीसुद्धा आणखी पदार्थ हवे असल्यास 'पावाची पाचशे पंचावन्न पक्वान्ने'
मिळण्याची वाट पहावी.

Wednesday, April 01, 2009

कशावर अधिक विश्वास ठेवावा?


दोन वर्षांपूर्वी एकदा बाहेरगांवी जाऊन १ एप्रिल रोजी मुंबईला परत येत असतांना वाटेत एक वर्तमानपत्र घेतले. तेंव्हा अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न ठरले होते, पण तेजी बच्चन यांच्या आजारपणामुळे त्या लग्नाची तारीख जाहीर झाली नव्हती, तसेच ते साध्या पध्दतीने समारंभाशिवाय होईल असे ऐकिवात होते. पण त्या वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावर वर दिलेली शुभमंगलाची सचित्र बातमी वाचकाचे लक्ष वेधून घेत होती. त्यात विश्वास न बसण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या पण तंबी दुराई (यांचे खरे नांव काय बरे असेल? अशोक नायगांवकर तर नसेल?) यांनी आपल्या खुमासदार भाषेत लिहिलेले वर्णन लोक चवीने वाचत होते. ही एप्रिल फूलची गंमत असणार हे वाचतांना लक्षात येतच होते. ही सारी माहिती घरकाम करता करता वार्ताहराचा डबलरोल करणा-या सखुबाई साळुंखे यांनी पुरवली असल्याची शेवटची तळटीप वाचल्यानंतर त्याबद्दल मनात शंका उरत नव्हती. अर्थातच त्यात दाखवलेले छायाचित्र (क्र.१) ग्राफिक्समधील कौशल्याचे उदाहरण असणार. यात दाखवलेली माणसे तर खरी आहेत. वेगवेगळ्या छायाचित्रामधून ती कदाचित या समारंभासाठी एकत्र आली असतील. जरा जवळून पहावे म्हणून मी स्वतःसुध्दा त्या चित्रात घुसण्याचा प्रयत्नही केला, पण ताडमाड उंच अभिषेकच्या खांद्यापर्यंत माझे डोके जेमतेम पोचले. हा सचिन माझ्यापेक्षा उंच कसा आणि कधी झाला कुणास ठाऊक? शिवाय शिकाऊ मेकअपमॅननेही माझ्या तोंडाला उठून दिसणारे जरा वेगळेच रंग लावले बघा!


वर दिलेले दुसरे चित्र वर्तमानपत्राच्या आतल्या पानावर छापले होते. पण त्यासोबत एक गंभीर स्वरूपाची बातमी होती. एका भाविक पर्यटकाने रोममधील एका चर्चला भेट दिली असतांना झरोक्यामधून येणा-या मनोहर प्रकाशकिरणांचे छायाचित्र काढले, त्यात एका देवदूताचे दर्शन दिसले आणि त्यामुळे जगभर खळबळ उडाली आहे म्हणे. ती बातमी वाचल्यावर माझ्या मनात उगाचच कांही मूलभूत शंका आल्या. हा देवदूत घनरूप आहे की द्रवरूप की वायुरूप? द्रवरूप किंवा वायुरूप असेल तर त्याला आकार असणार नाही
आणि घनरूप असेल तर तो उडेल कसा? तो एखाद्या फुग्यासारखा आहे कां? मग त्याला कान, डोळे, मेंदू, हृदय वगैरे असतील कां? असले तर ते कसल्या प्रकारचे आणि कुठल्या पदार्थांपासून बनवलेले असतील? असल्या वात्रट प्रश्नांची उत्तरे कांही केल्या सापडत नव्हती.


कांही लोकांना भूत पिशाच्च वगैरे डोळ्याने दिसतात पण त्यांचे फोटो येत नाहीत असे ऐकले होते. या देवदूतांची योनी यांच्या बरोबर उलट असावी. ते स्वतः तर कोणाच्या नजरेला पडले नाहीत पण त्यातला एकजण छायाचित्रात अवतीर्ण झाला. मी आपले सारे जुने आल्बम काढून पाहिले. कुठल्या तरी देवालयाच्या चित्रात कोणी यक्ष किंवा किन्नर दिसतो कां ते पाहू म्हंटले. पण आपले पूजारी मुळी देवळातले फोटोच काढू देत नाहीत हो! 'छायाचित्रण निषिद्ध' असे फलक सगळीकडे लावलेले असतात. इंग्लंडमधल्या चर्चेस, कॅथेड्रल्स वगैरेमध्ये तर फोटो काढायला केवढे उत्तेजन देतात? प्रवेशद्वारापाशीच फिल्म रोल वगैरे विकायलासुद्धा ठेवलेले असतात. म्हणजे तिथे भेट देणा-या लोकांनी त्यांच्या मनाला येतील तितके स्नॅप्स घ्यावेत याची चांगली सोय केलेली असते. यामुळे माझ्याकडील आल्बम्समध्ये हिंदू मंदिरांपेक्षा ख्रिस्ती प्रार्थनाघरांचीच छायाचित्रे जास्त मिळाली. पण देवदूताचे दर्शन कांही त्यात कुठेच घडले नाही. आणि घडणार तरी कसे? मी तर सगळी तेथील मूर्ती, झुंबरे व कलाकुसरीची छायाचित्रे जमवली होती. आता पुढच्या वेळेस झरोके वगैरे पहावेत असा विचार आहे.


तर मंडळी, तुम्ही ही दोन्ही छायाचित्रे पाहिल्यावर त्यातल्या कुठल्या चित्रावर जास्त विश्वास ठेवाल? पहिल्या की दुस-या?
.
.
.
.
.
.
.
.
योगायोगाने एक एप्रिलनंतर कांही दिवसांनीच मला रोमच्या त्या जगप्रसिध्द कॅथेड्रलला भेट देण्याची संधी मिळाली. तिथे फारसे झरोके नव्हतेच, जेवढे दिसले तेवढे सगळे झरोके मी न्याहाळून पाहिले. गाईडलासुध्दा या घटनेबद्दल विचारले. ही अफवा रोममध्ये कोणीही ऐकलीसुध्दा नव्हती असे त्याने सांगितले. म्हणजे ही थापदेखील कोणा भारतीयाच्याच सुपीक डोक्यातून निघाली असणार!