Friday, May 09, 2008

वानवडीचा मुक्काम- महादजी शिंदे यांची छत्री


पुण्याजवळ वानवडी येथे महादजी शिन्दे यांची छत्री आहे असे शाळेत असतांना इतिहासाच्या (कां भूगोलाच्या?) पुस्तकात वाचतांना खूप मजा वाटली होती. लढाईच्या धामधुमीत ते ती इथे विसरून गेले की कुणाला तरी त्यांनी आपली आठवण म्हणून ठेवायला दिली होती अशी पृच्छा सुद्धा केली होती. ती एक स्मारक म्हणून बांधलेली इमारत आहे असे समजल्यावर तितकीशी मजा राहिली नाही. तरीही ते नांव स्मरणाच्या कुठल्यातरी कोप-यात कोरले गेले आणि पुढच्या इयत्तेत गेल्यानंतर पुसले गेले नाही.
त्यानंतर अनेक वर्षांचा काळ गेला. अनेक वेळा पुण्याला जाणे व तेथे राहणेही झाले. पण वानवडीचा साधा उल्लेख सुद्धा कधी झाल्याचे आठवत नाही. आपण पुण्याला 'वानोरी' इथे फ्लॅट घेणार असल्याचे मुलाने सांगितले आणि जुनी आठवण एकदम जागी झाली. केंद्रीय विद्यालयात शिकतांना वानवडीची किंवा महादजी शिंदे यांची माहिती त्याला कधीच मिळाली नव्हती. त्यामुळे मी त्याबद्दल विचारल्यावर सुद्धा त्याच्या डोक्यात कुठलीच ट्यूब पेटली नाही.

दिवाळीनिमित्त त्याच्याकडे रहायला आल्यावर शोधाशोध सुरू केली. पुणे शहराने प्रसरण पावतांना वानवडीला गिळंकृत केले असल्याने आता ते 'पुण्याजवळ' राहिलेले नाही. त्याचाच भाग झाले आहे. 'विंडसर','ऑक्सफर्ड', 'रहेजा', 'गंगा' 'सेक्रेड हार्ट' अशा नांवांच्या मोठमोठ्या वसाहती उभ्या राहून सगळे वातावरण कॉस्मोपॉलिटन होऊन गेले आहे. मधेमधेच कोठे कोठे मराठमोळी जुनी वस्ती दिसते. त्याचेही बरेच शहरीकरण झालेले दिसते.

अशाच एका छोट्या रस्त्याच्या टोकाला महादजी शिंदे यांची सुप्रसिद्ध छत्री उभी आहे. ते जरी सन १७९४ मध्ये स्वर्गवासी झाले तरी त्यांच्या वंशजांनी सन १९१३ मध्ये हे स्मारक बांधले अशी नोंद केलेली संगमरवरी शिला तिथे बसवली आहे. नक्शीदार खांब व शिखर असलेले हे एक महादेवाचे प्रेक्षणीय असे मंदिर आहे. त्याची व्यवस्थित निगा राखलेली असल्याने चांगल्या सुस्थितीत आहे. शिंदे घराण्याचे आद्य संस्थापक सरदार राणोजी शिंदे यांच्यापासून अलीकडेच वारलेल्या माधवराव यांच्यापर्यंत सर्वांच्या तसबिरी भिंतीवर टांगल्या आहेत. त्यातच एक विजयाराजे यांचा फ्रेम न केलेला फोटो आहे.

येथील एका शिलेवरील लिखाण थोडे संस्कृतमध्ये व त्याहूनही थोडक्यात मराठीमध्ये केले असून हिंदीमध्ये लिहिलेली एक स्वतंत्र शिला आहे. त्यावर सुद्धा तत्कालीन संस्थानिकाचे नांव शिंदे न लिहिता सिंधिया असे लिहिलेले आहे. हा बदल कधी झाला हा आणखी एक संशोधनाचा विषय होईल.
संस्कृत लेखावर श्रीनाथ असे लिहिलेले पाहून ते एखादे स्तोत्र असावे असे वाटले. पण खालील मजकूर वाचल्यावर ते महादजी शिन्दे यांनी रचलेले नसून त्यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या छत्रीबद्दल असल्याचे समजते. शिन्देकुलरत्न महादजी हे संवत १८५० माघ शुद्ध १३ बुधवारी वैकुंठवसी झाले. त्यांचे प्रप्रपौत्र महाराज माधवराव शिन्दे यांनी संवत १९८१ ज्येष्ठ शुद्ध ५ शनिवारी या छत्रीची प्रतिष्ठापना केली असे त्यात लिहिले आहे.

या आवारात छत्रीची एक छोटीशी चौकोनी इमारत असून त्यावर एक घुमट आहे. ही इमारत बंदच ठेवलेली दिसली. तिच्या खिडकीमधून आतील समाधीचे दर्शन होते. तेथे त्यांचा मुखवटा ठेवला असून एक घोड्याची मूर्ती आहे. महादजींनी सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात मराठी राज्याचे सेनापतीपद भूषवले होते व वडगांवच्या लढाईत इंग्रजांचा पराभव केला होता. ग्वाल्हेर येथे त्यांची राजधानी असली तरी पुण्याच्या राजकारणात त्यांचे महत्त्वाचे स्थान होते व तेथेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ ही छत्री बांधण्यात आली.

त्याशिवाय एका दुमजली सुंदर इमारतीत महादेवाचे मंदिर असून त्याच्या गाभा-यात शिवलिंग आहे. चुनागच्चीच्या सुबक कोरीव काम केलेल्या भिंतीवर स्टेन ग्लासच्या खिडक्या आहेत. आंत गेल्यावर मधोमध उंच सीलिंग असलेला दिवाणखाना असून बाजूने सज्जे आहेत. त्याच्या कडेने शिन्देकुलातील महारथींच्या तसबिरी मांडून ठेवल्या आहेत. गाभा-याची वेगळी इमारत आहे त्यावर अत्यंत सुन्दर रेखीव काम केलेला उंच घुमट आहे. छत्री व देवळाच्या इमारतींच्या भोवताली एखाद्या तुरुंगासारखी पुरुषभराहून उंच भिंत आहे. आत जाण्यासाठी एक कमान व प्रवेशद्वार आहे. त्याच्या समोर एक मोठा जुना वृक्ष आहे.
हे एक ऐतिहासिक आठवणी जाग्या करणारे प्रेक्षणीय ठिकाण आहे. एकंदरीत पहाता वानवडीचा मुक्काम थोडा सत्कारणी लागला असे म्हणायला हरकत नाही.

Thursday, May 08, 2008

आर्किमिडीजने काय केले ?

एका ठिकाणी सत्यनारायणाची कथा सुरू होती. धनसंपत्तीऐवजी लतापल्लवाने भरल्यामुळे आपली नौका पाण्यातून वर आलेली साधुवाण्याने पाहिली हे ऐकल्यावर मला आर्किमिडीजच्या सिध्दांताची आठवण झाली. आरती, तीर्थ प्रसाद ग्रहण वगैरे झाल्यावर गप्पा मारतांना सहज ते माझ्या बोलण्यात आलं.
"म्हणजे काय? आपल्या पूर्वजांना सगळं कांही माहीत होतंच मुळी." कोणीतरी म्हणालं.
"अहो, या इंग्रजांनी आमचं ज्ञान पळवून नेलं आणि आपल्या नांवानं खपवलं." कुणीतरी री ओढली. "आर्किमिडीजनं म्हणे उध्दरणशक्तीचा शोध लावला म्हणजे काय तर पाण्यावर लाकूड तरंगतं असं सांगितलं कां?"
"अरे रस्त्यातून नागडा पळणारा येडा तो."
"आपल्या वानरसेनेनं बघा, रामनामाच्या जोरानं पाण्यावर दगड तरंगवले."
"अहो नासानं सुध्दा लंकेचा पूल मान्य केलाय्. त्याचे दुर्बिणीतून फोटो सुध्दा काढलेत."
मग आर्यभट, भास्कराचार्य, ज्ञानेश्वर वगैरेंच्या श्लोक, ओव्या वगैरे मधील वैज्ञानिक शोधांचे उल्लेख सांगून झाले, आर्किमिडीज पासून कोपर्निकस, पास्कल, न्यूटनपर्यंत सगळ्या थोर शास्त्रज्ञांचं महत्व मोडीत निघालं आणि माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्यांना मेकालेची अवलाद म्हणून हिणवणं झालं. तशी ही सारी मंडळी चांगली पदवीधर होती, निदान कॉलेजात शिकत होती. त्यांना अडाणी म्हणून सोडून देता येत नव्हते.
मग मी त्यांच्याच कलानं घ्यायचं ठरवलं. विचारलं, "तुम्हाला पोहायला येतच असेल, निदान कधी तरी गळ्यापर्यंत पाण्यात उभं राहिलाच असाल. तेंव्हा हलकं हलकं वाटलं की नाही?"
"अहो हीच तर पाण्याची उध्दरणशक्ती, ते आपल्याला वर उचलत असतं."
मी म्हंटलं, "ज्यानं कधी उध्दरणशक्तीचं नांव सुध्दा ऐकलेलं नाही अशा एखाद्या अशिक्षित खेडुताला सुध्दा हलकं वाटतच असेल ना?"
"वाटणारच. हा तर निसर्गाचा नियम आहे." उत्तर आलं.
"पाण्यात शिरल्यावर हलकं वाटणं, कांठावरील झाडांची पाण्यात पडलेली पानं, फांद्या तरंगतांना दिसणं हे तर सर्वसामान्य बुध्दी असलेल्या कुठल्याही प्राण्याला समजतं. आर्किमिडीजच्या काळातील माणसांना ते माहीत नसेल कां?" मी विचारलं.
"मग त्या आर्किमिडीजनं काय केलं?"
" सांगतो. पण त्याआधी आणखी एक गोष्ट. लोखंड, तांबे, पितळ, सोने, चांदी वगैरे धातूसुध्दा हजारो वर्षापासून माणसाच्या वापरात आहेत. त्याचा गोळा किंवा पत्रा पाण्यात पडला तर बुडतो हे त्यांनी पाहिले असेल. तसेच रिकामा तांब्या किंवा घागर अलगद पाण्यावर सोडली तर तरंगते हेही पाहिलं असेल."
"या तर रोजच्या अनुभवाच्या गोष्टी झाल्या. त्यात आर्किमिडीजनं वेगळं काय सांगितलं?"
"त्यानं या रोजच्या अनुभवाच्या गोष्टींचा सखोल अभ्यास केला. हलकं वाटतं म्हणजे खरोखरच त्या वस्तूचं वजन कमी होतं कां हे त्यानं तराजूवर मोजून पाहिलं. एखाद्या वस्तूचं पाण्याबाहेर असतांना नेमकं किती वजन असतं आणि पाण्यात कितपत बुडवल्यावर ते किती कमी होतं याचा हिशोब ठेवला. आधी एक पात्र पाण्याने शिगोशीग भरून घेतलं. त्या पाण्यात ती वस्तू बुडवल्यावर बाहेर सांडणारं पाणी गोळा करून त्याचं वजन केलं. या वजनांची तुलना केली. दोन्ही वजनं सारखी भरली. दगड, लाकूड, लोखंड वगैरेचे वेगवेगळ्या आकाराचे तुकडे घेऊन त्यावर हाच प्रयोग करून पाहिला. त्या प्रयोगातील निरीक्षणांचा अभ्यास केला आणि पूर्ण खात्री पटल्यानंतर एका समीकरणाच्या रूपांत आपला सिध्दांत मांडला. हा समीकरणरूपातील सिध्दांत म्हणजे उध्दरणशक्तीचा शोध. "
"पण त्या रस्त्यातून नागड्यानं धांवत सुटण्याचं काय?"
"ती एक मजेदार गोष्ट आहे. ग्रीसच्या राजानं एक सोन्याचा मुकुट बनवून घेतला होता. पण सोनारानं लबाडी करून त्यात भेसळ केली असावी असा संशय त्याला आला. हे खरं की खोटं हे शोधून काढायचं कठीण काम त्यानं आर्किमिडीजला दिलं. त्या काळच्या तंत्रज्ञानानुसार सोन्याचा खरेपणा शोधायचे दोनच रूढ मार्ग होते, एकतर भट्टीत टाकून तापवून नाहीतर तीव्र आम्लामध्ये बुडवून पहाणं. दोन्हीमध्ये तो सुंदर नक्षीदार मुकुट खराब होणार. निदान तशी शक्यता होतीच. तसे न करता त्यातील सोन्याचा कस कसा पहायचा हे एक फक्त आर्किमिडीजलाच नव्हे तर दरबारातील विद्वत्तेपुढे आव्हान होते. त्यासाठी सोन्याच्या तिस-याच कुठल्यातरी गुणधर्माचा उपयोग करता येईल कां असा विचार आर्किमिडीज करीत होता. पाण्याच्या टबात उतरल्याबरोबर त्याला पाण्याच्या उध्दरणशक्तीची जाणीव झाली व त्याचा उपयोग सोन्याची घनता मोजण्यासाठी करता येईल ही नामी कल्पना सुचली. मनावरील एक मोठे दडपण उतरल्यामुळे त्याला इतका आनंद झाला की अंगावर कपडे चढवण्याचं सुध्दा भान राहिलं नाही. कुठल्याही कारणाने अत्यंत भावनावेग झाला की माणसाचं देहभानसुध्दा हरपतं."
"म्हणजे आर्किमिडीजनेच उध्दरणशक्तीचा शोध लावला म्हणायचं? "
"उध्दरणशक्तीची व्यवहारातील अनेक उदाहरणे आपल्याला साहित्यामध्ये मिळतील. पण समीकरणाच्या ज्या स्वरूपात आर्किमिडीजने निसर्गाचा हा नियम मांडला आणि उदाहरणाने दाखवून दिला तशा अर्थाचा दुसरा संदर्भ आपल्याला मिळत नाही तोपर्यंत तरी तसेच म्हणावे लागेल."

गांधर्व महाविद्यालय (भाग २)


आज झिम्बाब्वे किंवा ग्वाटेमालासारख्या देशात काय चालले आहे ते आपण घरबसल्या टीव्हीवर पाहू शकतो. शंभर वर्षांपूर्वी कसलीच दृक्श्राव्य माध्यमे उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन पाहणे किंवा वाचन, श्रवण एवढीच माहिती मिळवण्याची साधने असायची. त्यामुळे स्व.विष्णू दिगंबर पलुस्करांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी आधी स्वतः देशभर भ्रमण करायचे ठरवले. त्या कामासाठी आपल्या गुरूजींचा आशिर्वाद आणि निरोप घेऊन त्यांनी मिरज सोडले आणि ते प्रथम बडोद्याला गेले. त्या काळातले बडोद्याचे महाराज त्यांच्या कलासक्तीसाठी प्रसिध्द होते. गायन, वादन, चित्रकला. शिल्पकला आदी सर्व कलांना ते सढळ हाताने मदत करून प्रोत्साहन देत असत. त्यामुळे बडोदा हे शहर पूर्वी अनेक कलाकारांना आकर्षित करीत असे.

असे असले तरी स्व.पलुस्कर थेट बडोद्याच्या महाराजांच्या चरणी मस्तक ठेवायला गेले नाहीत. त्यांनी तिथल्या एका देवळात आपल्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम ठेवला. देवदर्शनाला येणारी भक्तमंडळी व आजूबाजूला राहणारे लोक यांना तोंडी सांगणे, कांही हँडबिले वाटणे, जाहीर फलक लावणे अशा साधनाने प्रसिध्दी करण्यात आली. अशा प्रकारचे संगीत ऐकणे लोकांना नवीनच होते, पण त्यांना ते खूप
आवडले व त्यांच्या कार्यक्रमाला गर्दी होऊ लागली. याची बातमी महाराजांना लागली आणि त्यांनी सन्मानाने स्व.पलुस्करांना बोलावणे पाठवले. त्यांचे गायन ऐकून त्यांना राजगायकाचे पद देऊ केले.

त्या काळात ही एक मोठी गोष्ट होती. ते पद स्वीकारल्यावर राहण्याजेवण्याची उत्तम सोय होणार होती आणि आयुष्याची ददात मिटणार होती. महाराजांची मर्जी राखून ठेवण्यापुरते त्यांच्या दरबारात गायन केल्यानंतर उरलेला सारा वेळ संगीताची साधना करण्यात घालवता आला असता. पण पलुस्करांना मनापासून जे कार्य करायचे होते ते असे नोकरीत अडकून पडल्यावर करता आले नसते. त्यामुळे त्यांनी
विनम्रपणे नकार दिला आणि आपला मुक्काम हलवला. पुढील तीन चार वर्षे ते भारतभर फिरत राहिले. जागोजागी आपले कार्यक्रम करून दाखवून श्रोत्यांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी मिर्माण करायची तसेच इतर कलाकारांचे गायन ऐकून त्यातल्या बंदिशी, चिजा, गाण्याच्या पध्दती वगैरेंचा अभ्यास करायचा आणि त्यातून आपले ज्ञान व कौशल्य समृध्द करायचे असा दुहेरी कार्यक्रम त्यांनी सुरू ठेवला.

दि.५ मे १९०१ रोजी लाहोरला असतांना त्यांनी गांधर्व महाविद्यालय ही संस्था स्थापन केली आणि तिच्यामार्फत संगीताचे रीतसर शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्या काळी ही कल्पना नवीनच होती. परंपरागत गुरू शिष्य परंपरेने शिकवणारे बुवा किंवा उस्ताद आपापल्या मर्जीप्रमाणे किंवा कल्पनेप्रमाणे आणि शिष्याची कुवत व ग्रहणशक्ती पाहून त्यानुसार त्यांना संगीत शिकवत असत. शाळेय शिक्षणासारखा पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके, परीक्षा पध्दती वगैरे कांहीसुध्दा या क्षेत्रासाठी त्या काळात अस्तित्वात नव्हते, कदाचित इतर कोणी त्याची कल्पनाही केली नसेल. पलुस्करांनी मात्र हे सगळे योजून ठेवले होते.

त्यांनी संगीताच्या शिक्षणातील प्रगती मोजण्याच्या पाय-या निर्माण केल्या. या कल्पनेचा विकास होऊन प्रारंभिक, प्रवेशिका (प्रथम व पूर्ण), मध्यमा (प्रथम व पूर्ण), विशारद (प्रथम व पूर्ण), अलंकार (प्रथम व पूर्ण) अशा श्रेणी निर्माण झाल्या. सुरुवातीला लहान मुलांच्या लक्षात राहतील अशी गाणी त्यांना चालीवर शिकवायची. यासाठी त्या काळातल्या बंदिशी न घेता पलुस्करांनी सोपी भजने निवडून त्यांना
रागदारीवर आधारलेल्या चाली लावल्या आणि ती शिकवायला सुरुवात केली. चाली लक्षात राहिल्यावर त्यांच्या आधाराने थोडे आलाप, ताना घ्यायला शिकवायच्या असे करत मुलांना गोडी वाटेल अशी हळू हळू प्रगती करीत त्यांना रागदारीचे ज्ञान ते देत जात असत. गोविंदराव पलुस्करांनी याची कांही उदाहरणे गाऊन दाखवली. अशा गाण्यांच्या छोट्या पुस्तिका स्व.विष्णू दिगंबरांनी खास तयार करवून घेतल्या होत्या.

स्व.विष्णू दिगंबर पलुस्करांनी विद्यार्थ्यांची दोन गटात विभागणी केली होती आणि ते त्यांना वेगवेगळ्या स्तरावर शिक्षण देत असत. सर्वसाधारण विद्यार्थ्यांना वर सांगितलेल्या पध्दतीने शिकवीत असत, तर कांही निवडक विद्यार्थ्यांना ते पुढे जाऊन संगीतशिक्षक बनावेत अशा हेतूने वेगळ्या पध्दतीने शिकवत असत. स्वतः उत्तम गाता येणे आणि शास्त्रशुध्द गायन समजून ते शिकवता येणे या वेगळ्या गोष्टी
आहेत हे त्यांना पूर्णपणे माहीत होते. त्यामुळे ज्यांनी शिक्षक बनावे असे त्यांना वाटले त्यांना ते स्वर, ताल, लय यांचेविषयीचे मूलभूत ज्ञान विस्तारपूर्वक देत, रागदारीमधील बारकावे समजावून सांगत, स्वरलिपीमध्ये प्राविण्य मिळवायला शिकवीत अशा अनेक प्रकाराने त्यांची उत्तम तयारी करवून घेत असत. कांही लोकांना दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे जमतात अशीही उल्लेखनीय उदाहरणे आहेत. मात्र
परंपरागत पध्दतीत स्वतः अधिकाधिक नैपुण्य मिळवण्यावर भर असे, तर पलुस्करांनी द्रष्टेपणाने संगीतशिक्षकांची पिढी तयार केली आणि संगीताच्या प्रसारकार्यासाठी त्यांना लखनऊ, काशी वगैरे ठिकाणी पाठवून दिले. तिथे जाऊन त्यांनी वेगवेगळ्या संस्थांमधून कार्य करून शास्त्रीय संगीताचा प्रसार केला अशी कांही उदाहरणे गोविंदरावांनी सांगितली.

शास्त्रीय संगीताला आता उच्चभ्रू वर्गात सन्मानाचे स्थान मिळाले आहे. आकर्षक वाटणा-या पाश्चात्य संगीताच्या कोलाहलातसुध्दा अभिजात हिंदुस्थानी संगीत आपली लोकप्रियता टिकवून आहे. हे सगळे होण्यामागे स्व. विष्णू दिगंबर पलुस्करांनी केलेल्या तपश्चर्येचा मोठा वाटा आहे असे म्हणावेच लागेल. त्यांनी सुरू केलेल्या गांधर्व महाविद्यालय या संस्थेने शंभर वर्षाहून अधिक काळ हा ज्ञानयज्ञ प्रज्वलित ठेवला आहे. येणा-या काळात हे काम पुढे नेण्यासाठी कांही नव्या योजना विचाराधीन आहेत असे सूतोवाच संस्थेच्या पदाधिका-यांनी केले. ठराविक कालावधीने या संस्थेच्या निवडणुका होतात आणि नवी मंडळी तिच्या कार्याची धुरा खांद्यावर घेऊन मोठ्या उत्साहाने आणि समर्थपणे ती वाहून नेतात हे गेली पंचवीस तीस वर्षे मी दुरूनच कां होईना, पण पहात आहे. त्यामुळे ती यापुढेही अशीच चैतन्याने भारलेली राहील अशी मला खात्री वाटते.

Wednesday, May 07, 2008

गांधर्व महाविद्यालय (भाग १)


मुंबईचे सी.एस.टी. (पूर्वीचे व्हीटी) स्टेशन, राजाबाई टॉवर, हायकोर्ट वगैरे जुन्या इमारतींनी आपली जन्मशताब्दी साजरी केली असेल. ज्या कारणासाठी त्या बांधल्या गेल्या होत्या त्या रेल्वे, युनिव्हर्सिटी, न्यायालये आदि ब्रिटीशांच्या कालखंडात सुरू झालेल्या संस्था तर नक्कीच शंभर वर्षापेक्षा जुन्या आहेत आणि आजही कार्यरत आहेत. उद्योग व्यवसायक्षेत्रातील कांही घराणीसुध्दा गेल्या शंभर वर्षांपासून
चालत आलेली असतील. शंभर वर्षांपूर्वीच्या म्हणजे लोकमान्य टिळकांच्या काळात अनेक देशभक्तांनी समाजाला उपयुक्त पडतील अशा संस्था विविध क्षेत्रात सुरू केल्या होत्या. त्यातल्या कांही संस्थांची त्या वेळी ठरवलेली उद्दिष्टे पूर्ण झाली, कालांतराने बदललेल्या परिस्थितीत त्यांचे महत्व कमी झाले, मूळ संस्थापकानंतर त्याच तळमळीने कार्य करणारे कार्यकर्ते उपलब्ध झाले नाहीत अशा वेगवेगळ्या कारणांमुळे त्यातल्या कांही संस्था अस्तंगत झाल्या, तर कांही संस्थांनी नवनवी कामे हाती घेऊन कार्याचा आवाका वाढवत नेला. आज त्यांचे मोठे वटवृक्ष फोफावले आहेत.

गांधर्व महाविद्यालय ही एक संस्था गेली शंभराहून अधिक वर्षे मुख्यतः मूळ उद्देशाला चिकटून उभी आहे आणि त्याचबरोबर काळानुसार आवश्यक तेवढे बदल घडवून आणून तंत्रज्ञानातल्या प्रगतीचा लाभ घेत आली आहे. इसवी सन १९०१ साली सुरू झालेल्या या संस्थेचा वर्धापन दिन परवा ५ मे रोजी वाशी येथील गांधर्वनिकेतनाच्या प्रांगणात साजरा झाला. हा एक साधेपणाने पण जिव्हाळ्याने घडवून आणलेला आटोपशीर असा समारंभ होता. सुरुवातीला सध्याच्या पदाधिकारी वर्गाने उपस्थित मान्यवरांचे तसेच श्रोत्यांचे स्वागत केले. जास्त लांबण न लावता मोजक्याच पण अर्थपूर्ण शब्दात हा औपचारिक कार्यक्रम आटोपल्यावर पं.गोविंदराव पलुस्कर यांनी आपल्या मुख्य भाषणात श्रोत्यांना थेट शंभर वर्षांपूर्वीच्या काळात नेले.

गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक स्व.विष्णू दिगंबर पलुस्कर हे एक ऋषितुल्य व्यक्तीमत्व होऊन गेले. सन १८८६-८७ च्या सुमारास त्यांनी मिरजेचे स्व.पं.बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुरू केले. संगीताचे शिक्षण घेताघेता ते तत्कालीन भारतीय समाजातील परिस्थितीकडे डोळसपणे पहात होते. ( खरे तर त्यांची दृष्टी अधू होती. ती तशी असली तरी मनःचक्षू समर्थ होते).
त्या काळात शास्त्रीय संगीताला समाजात प्रतिष्ठेचे स्थान नव्हते. एका बाजूला भजन, कीर्तन, भारुडे इत्यादी भक्तीसंगीत आणि दुस-या बाजूला शाहिरी पोवाडे, लावण्या वगैरे गाणी अशा पध्दतीने लोकसंगीत जनमानसाच्या रोमारोमात भिनले असले तरी शास्त्रशुध्द संगीत मात्र लोकांच्या कानापर्यंत पोचतच नव्हते. त्या काळात रेडिओ, टीव्ही सारखी प्रसारमाध्यमे नव्हती, रेकॉर्डसुध्दा नव्हत्या. मोठमोठे उस्ताद, खाँसाहेब, पंडित, बुवा वगैरे शास्त्रीय संगीतातले बहुतेक गुणीजन त्या काळातल्या राजेरजवाडे, संस्थानिक, नवाब किंवा किमानपक्षी जहागिरदार, सधन व्यापारी अशा धनाड्य लोकांच्या आश्रयाने रहात असत. त्यांच्या मनोरंजनासाठी त्यांचे राजवाडे, महाल, हवेल्या वगैरे जागी त्याच्या मैफली होत आणि त्यात मालकांच्या मर्जीतील निवडक मंडळींनाच प्रवेश मिळत असे. यामुळे सामान्य जनतेला अभिजात संगीताचा आनंद मिळत नसे. त्या काळातील या कलाकारांतले कांही महाशय जास्तच लहरी असत, कांही शीघ्रकोपी म्हणून तर कांही चंगीभंगीपणासाठी ओळखले जात. इतर कांही लोकांबद्दल विनाकारण अशा वावड्या उठवल्या जात. एकंदरीत संगीत आणि संगीतकार यांबद्दल सर्वसामान्य सभ्य लोकांचे मत फारसे चांगले नसल्यामुळे ते त्यांच्याशी फटकून वागत असत. संगीत रंगभूमीने शास्त्रीय संगीताची थोडीशी झलक लोकांपर्यंत पोचवायला नुकतीच सुरुवात केली होती. पण नाटकवाल्यांपासूनही लोक थोडे दूरच रहात असत.

स्व.पलुस्करांना याचे फार वाईट वाटत असे. ही परिस्थिती बदलायला पाहिजे, सर्वसामान्य लोकांना दैवी शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेता आला पाहिजे, संगीतज्ञांची प्रतिमा उजळली पाहिजे, त्यांचा जनसंपर्क सुधारला पाहिजे, संगीत आणि संगीतज्ञ यांना प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे असे त्यांना सारखे वाटत असे. यावर गंभीरपणे विचार करून त्यांनी स्वतःला या कार्याला वाहून घ्यायचे ठरवले. नुसतेच ठरवले
नाही तर त्या कार्याची दिशा निश्चित केली आणि स्वतःला त्या कार्यात झोकून दिले.
. . . . . . . . (क्रमशः)

Monday, May 05, 2008

थोर भारतीय शास्त्रज्ञ (भाग ५)

मला ईमेलवरून आलेल्या एका लेखाबद्दल सांगता सांगता त्याचे चार भाग झाले तरी त्या लेखात एवढे काय लिहिले होते ते कांही मी सांगितलेले नाही. याचे कारण असे आहे की त्यातील माहिती त्रोटक स्वरूपाची होती, जगप्रसिध्द पाश्चात्य शास्त्रज्ञांचे श्रेय काढून घेऊन ते आपल्या पूर्वजांना देण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यात केला होता आणि त्यात दिलेली कांही माहिती मला इतर विश्वसनीय अशा श्रोतांमधून मिळालेल्या माहितीशी जुळत नव्हती. उदाहरणार्थ वराहमिहिराचा सूर्यसिध्दांत या लेखात भास्कराचार्यांना जोडला होता आणि त्यात गुरुत्वाकर्षणाचा शोध दिला आहे असे लिहिले होते. "हिणकस धातूंचे रूपांतर सोन्यात करणे किंवा एका विश्वातून दुस-या विश्वात जाणारे यान तयार करणे अशा आजच्या शास्त्रज्ञांना अजूनही न जमलेल्या करामती आमच्या या पूर्वजांनी प्रत्यक्षात आणल्या होत्या." हे विधान वाचल्यानंतर माझ्या दृष्टीने त्या लेखातील मजकुराची विश्वासार्हता संपली. त्यात अतिशय सुंदर अशी चित्रे दिलेली आहेत, पण कलाकाराचे स्वातंत्र्य लक्षात घेऊनसुध्दा विज्ञानविषयाच्या चित्रात दाखवलेले अशास्त्रीय वाटणारे बारीकसारीक तपशील मला खटकले. मी माझ्या इनबॉक्सचे दार उघडून हा चित्रमय लेख दाखवू शकत नाही, पण ते लेख मला आंतर्जालावर खालील पत्यांवर सापडले. वाचकांनी स्वतः भेट देऊन ते पहावेत.
http://www.agni.nl/cms/index.php?id=40,116,0,0,1,0
http://www.yoga-in-daily-life.org/download/Great_Indians.pdf

हा ब्लॉग लिहिता लिहिता मी आंतर्जालावर जे उत्खनन केले त्यात भरपूर चांगली माहिती मिळाली, माझे कांही पूर्वग्रह दूर झाले तर कांही अधिक बळकट झाले, पण एकंदरीत माझ्या मनात असलेला प्राचीन शास्त्रज्ञांविषयीचा आदर द्विगुणित झाला. इसवी सन ५०० ते १२०० या भारतीय खगोलशास्त्राच्या व गणितशास्त्राच्या सुवर्णकाळात आर्यभट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त व भास्कराचार्य आदि जे महान शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी अगदीच एकेकट्यांनी आपले संशोधनकार्य केले नव्हते. त्यांच्या ग्रंथांवर एकमेकांनी तसेच इतरांनी भाष्य किंवा टीका लिहिल्या होत्या. त्यांचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले होते आणि हे ज्ञान अरब विद्वानांमार्फत पाश्चात्य देशात गेले होते. हस्ते परहस्ते त्यातल्या कांही संकल्पना कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन आदींपर्यंत पोचल्या असतील सुध्दा. अर्थात त्या लोकांनी त्यावर सखोल संशोधन करून ते ज्ञान पूर्णत्वाला नेल्याचे महत्व कमी होत नाही.

अंकगणित, बीजगणित, भूमिती आदी गणिताच्या शाखांमध्ये तर आपले शास्त्रज्ञ अतिशय प्रवीण होते असे त्यांच्या लेखनावरून स्पष्ट होते. हे प्राविण्य संपादन करतांना त्यांनी त्यांच्या काळापर्यंत पूर्वापार चालत आलेल्या गणितशास्त्रावर प्रभुत्व मिळवले होते की त्यातले नवनवीन प्रकार शोधून काढले होते हे समजणे अवघड आहे. शकुंतलादेवींचे प्राविण्य आपण पाहिले आहे. त्यांच्या कुशाग्र बुध्दीमत्तेचा, अचाट स्मरणशक्तीचा आणि त्यांनी केलेल्या तपश्चर्येचा हा चमत्कार आहे असे आपण म्हणू, पण त्यांनी गणितशास्त्रात नवे शोध लावले असे म्हणणार नाही कारण जी गणिते त्या चुटकीसरशी सोडवू शकतात ती जास्त वेळ लावून सोडवण्याच्या पध्दती अस्तित्वात आहेत. दशमानपध्दत, ' पाय ' चे अचूक मूल्य आदी कित्येक गोष्टी सर्वात आधी आपल्या शास्त्रज्ञांच्या ग्रंथात सापडतात म्हणून त्यांचे श्रेय त्यांना कदाचित देता येईल. त्यातही त्यांची दशमानपध्दत पूर्णांकातच मर्यादित असावी. ' . ' देऊन पुढे दशांश, शतांश, सहश्रांश वगैरे लिहिल्याची उदाहरणे सापडत नाहीत. अपूर्णांक हे अपूर्णांकातच लिहिले गेले आहेत.

या भारतीय शास्त्रज्ञांनी आपली ग्रंथरचना काव्यबध्द केली आहे. त्यामुळे ते पाठ करून लक्षात ठेवायला सोपे जात असले तरी शास्त्रीय माहिती छंदात किंवा वृत्तात बसवून यमक साधण्यात तिचा नेमकेपणा रहात नाही आणि समजायला कठीण होते. काव्य जुळवतांना एकादा जादा शब्द घातला जातो किंवा वगळला जाते. रसनिष्पत्तीसाठी उपमा, उत्प्रेक्षा आदी अलंकारांचा सढळ उपयोग होतो. त्यांच्या काळात कुठल्याही विधानाचा शास्त्रीय आधार दाखवण्याची पध्दत नसावी. त्यामुळे आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास ' फॉर्म्युले' मिळतात पण त्यांचे ' डेरिव्हेशन' मिळत नाही. बहुतेक लोक फॉर्म्युला मिळाला, आपले काम झाले म्हणून खूष होतात, पण माझ्यासारख्या चिकीत्सकाचे तेवढ्यावर समाधान होत नाही.

बाराव्या शतकात भास्कराचार्यांनी लिहिलेल्या सिध्दांतशिरोमणी या ग्रंथानंतर या शास्त्रज्ञांची परंपरा खंडित झाली ती कायमचीच. त्यानंतर अनेक शतकांच्या कालानंतर पुन्हा त्यांचे ग्रंथ उजेडात आले. याबद्दल पाश्चिमात्य देशांमधील विद्वानांनी काय काय म्हंटले आहे याचे इतके संदर्भ दिसतात की अलीकडच्या काळात कदाचित त्यांनीच आपली ओळख आपल्या या पूर्वजांबरोबर करून दिली कां असा संभ्रम मनात येतो.
माझ्या ब्लॉगवर दिलेल्या प्रतिसादात आदरणीय श्री.फडणीस यांनी "वराहमिहिर याच्या नावाने सूर्यसिद्धांत ओळखला जातो. त्याने काय सिद्धांत मांडला होता ते मला माहीत नाही. हा एक अपवादच म्हणावा लागेल. " असा तिरकस टोला मारला आहे. शक्य तेवढे मराठी शब्द वापरण्याच्या नादात मी "थिअरी" या अर्थाने "सिध्दांत" हा शब्द वापरला होता. त्यामुळे कदाचित गोंधळ झाला असावा. "थिअरी" म्हंटले की त्याची पूर्वपीठिका, परीक्षण, निरीक्षण, विश्लेषण, सूत्रे, समीकरणे, उदाहरणे वगैरे त्याच्या अनेक अंगांनी केलेला अभ्यास डोळ्यासमोर येतो. तशा रीतीने भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले कार्य मला पहायला मिळाले नाही असे मला म्हणायचे आहे.

यासाठी पुन्हा एकदा न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचे उदाहरण पाहू. झाडावरून फळ खाली पडले इथून सुरुवात झाली असे धरले तरी न्यूटनच्याच ''लॉज ऑफ मोशनप्रमाणे पाहता 'फोर्स' लावल्याशिवाय कोणतीही स्थिर वस्तू जागची हलत नाही आणि गतिमान वस्तू त्याच वेगाने सरळ रेषेत पुढे जात राहते. इथे तर झाडावरून निसटलेले फळ खाली येतांना त्याचा वेगही वाढत जातांना दिसतो. या अर्थी कोणता तरी फोर्स त्याला सारखा खाली ओढत असणार. याला त्याने 'गुरुत्वाकर्षण' असे नांव दिले. लहानशी गोटी बोटाने टिचकी मारून उडवता येते पण तोफेचा गोळा दोन्ही हातांनी ढकलावा लागतो, म्हणजेच गति मिळवण्यासाठी लागणारा फोर्स वजनाच्या प्रमाणात वाढतो. गॅलिलिओने पिसाच्या मनो-यावरून लहान मोठ्या आकाराचे दगड खाली टाकून ते एकाच वेळी खाली पडतात हे दाखवलेच होते. जर त्यांना एकच वेग मिळत असेल तर हा 'गुरुत्वाकर्षणाचा फोर्स' वस्तुमानाच्या प्रमाणात वाढतो म्हणायचा. जमीनीला समांतर दिशेने फेकलेली वस्तू सरळ रेषेत पुढे न जाता वक्र मार्गाने खाली येत जाते आणि कांही अंतरावर जमीनीवर पडते. धनुष्याने सोडलेला बाण अधिक दूर जातो आणि बंदुकीतून सुटलेली गोळी त्याहून दूर जाऊन जमीनीवर पडते. एकादी वस्तू खूप उंचावरून सरळ रेषेत समोर फेकली आणि तिला फेकण्याचा वेग वाढवत गेलात तर केंव्हा तरी ती वस्तू खाली पडण्यामुळे तिच्या मार्गाला येणारी वक्रता पृथ्वीच्या पृष्ठभागाशी समांतर एवढी होईल आणि त्यानंतर ती वस्तू पृथ्वीभोवती गोल फिरू लागेल असे त्याला वाटले. झाडावरील फळ खाली पडते पण झाडामागील चंद्र खाली न पडता पृथ्वीभोंवती प्रदक्षिणा कां घालतो याचे कोडे त्याला उलगडले.

त्यानंतर पृथ्वीपासून चंद्राचे अंतर आणि पृथ्वीच्या मध्यापासून तिच्या पृष्ठभागाचे अंतर, कोणत्याही क्षणी चंद्राची सरळ रेषेतील गति आणि त्याच्या मार्गाला वक्रता आणण्यासाठी काटकोनात वळण्याची गति वगैरे सर्व गणिते मांडल्यानंतर एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. ती म्हणजे झाडावरून पडणा-या फळाला जे त्वरण प्राप्त होते ते चंद्राच्या त्वरणाच्या ३६०० पट असते आणि पृथ्यीपासून चंद्राचे अंतर पृथ्वीच्या मध्यापासून झाडाच्या फांदीपर्यंत जेवढे अंतर आहे त्याच्या ६० पट आहे. ६० चा वर्ग ३६०० झाला. अशा प्रकारे त्याने आपले सुप्रसिध्द समीकरण मांडले. त्याचा उपयोग करून पाण्यावर लाकूड कां तरंगते आणि लंबक आपल्याआप मागे पुढे कां होत राहतो यापासून ते ग्रह सूर्याभोवती का आणि किती वेगाने फिरतात इथपर्यंत अनेक निरीक्षणांचे स्पष्टीकरण करता आले. हे सगळे थिअरीमध्ये येते.

"सिध्दांत" हा शब्द भारतात वेगळ्या अर्थाने वापरला जात होता. "थिअरी" मध्ये जितक्या गोष्टी अपेक्षित असतात तितक्या त्यात येण्याची गरज नसते. यामुळे प्राचीन भारतातील विद्वानांनी अनेक विषयांवर असंख्य सिध्दांत सांगितलेले आहेत. वराहमिहिरानेच पंचसिध्दांत सांगितले आहेत. सूर्यसिध्दांत हा त्यातला एक महत्वाचा "सिध्दांत" आहे. त्याचे उदाहरण घेऊ. त्यावरील लेख वाचून मला जेवढे समजले त्याचा सारांश खाली दिला आहे.

अचिंत्याव्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने।समस्तजगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः।।

असे इशस्तवन करून या काव्याची सुरुवात होते. यात सुमारे पाचशे श्लोक आहेत. त्यात सूर्य, चंद्र, गुरू, शनी वगैरेंचे राशीचक्रात भ्रमण, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण वगैरे खगोलशास्त्रातले विषय आहेतच, ज्या कोज्या आधि त्रिकोणमितीतील संज्ञा आहेत, सांवलीवरून दिवसाचा काल, सूर्याचे आकाशातील स्थान, त्या जागेचे पृथ्वीवरील स्थान वगैरे ठरवण्याची पध्दत आहे. त्याशिवाय मनुष्यांचे आणि देवदानवांचे दिवस, वर्ष, युगे, कल्प, मनु वगैरे लक्षावधी वर्षांच्या कालखथंडाचा हिशोब सांगितला आहे. पाताल, मेरू पर्वत वगैरे पौराणिक संकल्पनांचे उल्लेख आहेत, पापनाशन आणि पुण्यसंपादन याबद्दलसुध्दा लिहिले आहे. अशा त-हेने अनेक विषयांना स्पर्श करणा-या या काव्यातले कांही श्लोक घेऊन तेवढेच वराहमिहिरांनी सांगितले असे म्हणता येणार नाही. सूर्य, चंद्र, गुरू, शनी वगैरेंचे राशीचक्रात भ्रमण, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण वगैरे खगोलशास्त्रातल्या गोष्टी केंव्हा घडतात हे त्यांनी सांगितले आहे. त्या काढण्याची रीतही दिलेली आहे, पंचांग बनवण्यासाठी ती उपयुक्त आहे. पण त्यामागची थिअरी दिसत नाही. त्यांनी दिलेल्या उत्तरावरून त्यांना अंतरिक्षातील गणिते सोडवण्याची रीत माहीत असावी असे गृहीत धरावे लागेल. ज्या गोष्टी आज पटत नाहीत त्या सोडून द्याव्या लागतील.

साराशरूपाने सांगायचे झाल्यास प्राचीन काळातल्या भारतीय शास्त्रज्ञांनी नेत्रदीपक अशी कामगिरी करून ठेवली आहे. ती डोळसपणाने समजून घेतल्यास नक्कीच स्फूर्तीदायक आहे. ते न करता फक्त आमचे म्हणून चांगले असे ठरवण्याने व सांगण्याने कांही साध्य होणार नाही.

Saturday, May 03, 2008

थोर भारतीय शास्त्रज्ञ (भाग ४)

महर्षी चरक, सुश्रुत व पतंजली हे भारतीय शास्त्रज्ञ, आर्यभट, भास्कराचार्यादी इतर भारतीय शास्त्रज्ञ आणि कोपरनिकस, न्यूटन वगैरे पाश्चात्य शास्त्रज्ञ यांत मी भेदभाव करतो आहे असे वाटण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे एकाच फूटपट्टीने त्यांची थोरवी मोजता येणार नाही. मुख्य म्हणजे त्यांचे सांगणे आपल्यापर्यंत ज्या प्रकारे पोचले आहे त्यात महत्वपूर्ण फरक आहे.

मागील लेखात नमूद केल्याप्रमाणे चरक, शुश्रुत व पतंजली यांनी ज्या आयुर्वेद व योगशास्त्र या विषयांवर ग्रंथरचना केली आहे ती शास्त्रे गुरुशिष्य किंवा पितापुत्रपरंपरेतून पिढी दर पिढी पुढे येत आजपर्यंत पोचली आहेत. प्रत्येक पिढीत त्याचा रोगनिवारण आणि शरीर व मनाचे आरोग्य राखण्यासाठी उपयोग होत आला आहे. त्यातून मिळालेल्या अनुभवाने त्यातील सिध्दांत किंवा उपचार सिध्द झाले आहेत तसेच ही शास्त्रे समृध्द होत गेली आहेत.

आर्यभट, भास्कराचार्यादींचे ज्ञान त्यांच्या शिष्यांच्या परंपरेतून आपल्यापर्यंत पोचले असे दिसत नाही. गांवागांवात जसे शास्त्री, पंडित, वैद्य असायचे तसे खगोलशास्त्रज्ञ असल्याचे ऐकिवात नाही. ज्योतिष सांगणारे विद्वान नवग्रहांच्या कुंडलीमधील भ्रमणावरून आपले जातक सांगत आले आहेत. सूर्यमालेची रचना, तारे, ग्रह आणि उपग्रह वगैरेंची माहिती आपल्याला या ज्योतिषांकडून मिळालेली नाही. ती माहिती
पाश्चात्य देशात झालेल्या संशोधनावरून आपण शिकलो आहोत. आर्यभट, भास्कराचार्यादी शास्त्रज्ञांनी लिहिलेले ग्रंथ वेगळ्याने प्रकाशात आले. भाषा किंवा वाङ्मयाचा अभ्यास करणा-या विद्वानांनी ते वाचले असावेत. खगोलशास्त्राच्या मुख्य प्रवाहात त्यातले ज्ञान आल्यासारखे दिसत नाही. त्यात नेमके काय काय लिहिले आहे हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलेले नाही. त्यावर तज्ञ खगोलशास्त्रज्ञांनी साधक बाधक चर्चा घडवून आणली, कोणी त्यांचे समर्थन केले, कोणी विरोध केला, कोणी शंका व्यक्त केल्या, कोणी त्यांचे निरसन केले वगैरे घडल्याचे निदान माझ्या ऐकिवात नाही. पश्चिमेकडून आलेले खगोलशास्त्र आज इतके पुढे गेले आहे की हजार वर्षांपूर्वी इतर कोणी काय लिहिले आणि त्यातले किती बरोबर आणि किती चुकीचे आहे वगैरे पहाण्यात आता कोणाला रस असणार नाही, कारण त्या शास्त्राच्या पुढील अभ्यासाच्या दृष्टीने या ग्रंथांची उपयुक्तता राहिलेली नाही.

कोपर्निकस, गॅलीलिओ वगैरेंची गोष्ट त्याहून वेगळी आहे. या लोकांनी जे संशोधनकार्य केले त्याला त्यांच्या हयातीत विरोधच झाला होता. पण कांही उत्साही वैज्ञानिकांना त्यांच्या सांगण्यात तथ्य आढळले. त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. त्यात ज्या त्रुटी आढळल्या त्या भरून काढल्या, ज्या चुका दिसल्या त्या सुधारल्या आणि त्या ज्ञानात आपली मोलाची भर टाकली. अशा प्रकारे आधुनिक खगोलशास्त्राचा विकास होत गेला. त्यात एक सातत्य असल्यामुळे जुन्या शास्त्रज्ञांनी केलेले बरेचसे कार्य मूळ स्वरूपात जगाला उपलब्ध होत गेले. तसेच त्यावर भरपूर चर्चा झाली, त्याची छाननी, विश्लेषण वगैरे होऊन ते सुसंगत स्वरूपात मांडले गेले आणि सुलभपणे मिळू शकते. त्यामुळे त्याबद्दल जेवढी सखोल आणि सलग माहिती मिळते त्या मानाने प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांच्या कार्याबद्दल कमी आणि तुटक स्वरूपाची माहिती असते. त्या दोघांची तुलना करून जे एकाने सांगितले तेच दुस-याने सांगितले होते की कांही वेगळे मांडले होते ते समजत नाही. तशी तुलना न करणेच माझ्या मते इष्ट आहे.

भारतीय शास्त्रज्ञ अंधारात कां राहिले याच्या मागे एक वेगळेच कारण असावे असा माझा अंदाज आहे. हिंदू संस्कृतीमध्ये पूर्वापारपासून चालत आलेला एक समज आहे. त्याप्रमाणे जगातील सर्व ज्ञानाचा उगम ब्रह्म्यापासून झाला. त्याने ते ज्ञान आपल्या पुत्रांना दिले आणि त्यांच्या शिष्यवर्गामार्फत त्याचा प्रसार होत गेला. अशा प्रकारे सर्व ज्ञान अपौरुषेय स्वरूपाचे आहे. त्यात फेरफार करण्याचा अधिकार मर्त्य
मानवाला नाही. त्याला गुरूकडून जे ज्ञान प्राप्त होईल त्याचा त्याने उपयोग आणि प्रसार करावा. त्यात बदल किंवा वाढ करण्याच्या भरास पडू नये. अशा प्रकारच्या ज्ञानसंपादन व संवर्धनाच्या प्रक्रियेत कोणी नवा विचार मांडला तर तो स्वीकारला जाणे दुरापास्त होते कारण कोठल्याही गोष्टीवर निर्णय घेतांना जुना शास्त्राधार पाहिला जात असे. त्यामुळे आर्यभट व भास्कराचार्यासारख्यांनी त्या काळातल्या
समजुतींच्या विपरीत कांही सांगितले असले तरी इतरांनी ते मान्य केले जाण्याची शक्यता कमीच होती. कदाचित त्यांचे विचार त्यांच्या ग्रंथातच पडून राहिले असावेत. गुरूशिष्य किंवा वंशपरंपरेनुसार प्रसारित होणा-या ज्ञानभांडारात ते समाविष्ट झाले नसावेत असा आपला माझा तर्क आहे.

वेगवेगळी स्तोत्रे, पुराणे वगैरेंची रचना करणा-या ऋषींची व आचार्यांची नांवे त्यांच्या रचनांना ....कृत किंवा ...विरचित म्हणून जोडलेली आहेत. पाश्चिमात्य देशात गणित व विज्ञानातील प्रमेये, नियम, समीकरण, सूत्र वगैरेशी त्या त्या संशोधकांची नांवे जोडलेली आहेत. 'पायथॅगोरस थीरम', 'आर्किमिडीज प्रिन्सिपल', 'न्यूटन्स लॉज' वगैरे शेकड्यांनी उदाहरणे देता येतील. गेल्या शतकात ज्या भारतीय
वैज्ञानिकांनी बहुमूल्य संशोधन केले त्यांनासुध्दा 'रामन इफेक्ट', 'चंद्रशेखर नंबर' वगैरे नामकरणातून अमरत्व प्राप्त झाले आहे. प्राचीन भारतात अशी प्रथा नसावी कारण "मी अमूक शोध लावला अशी प्रौढी कोणी मारत नसे" किंवा "त्याने हे सर्वात आधी सांगितले" असे श्रेय त्याला दिले जात नसेल. त्यामुळे विनयामुळे किंवा आकसामुळे पूर्वीच्या शास्त्रज्ञांची नांवे त्यांनी केलेल्या योगदानासह कुठल्या
ताम्रपटावर किंवा शिलालेखावर खोदून ठेवली गेली नसावीत. . . . . . . . . . . . (क्रमशः)

Friday, May 02, 2008

थोर भारतीय शास्त्रज्ञ (भाग ३)

ज्या दहा प्राचीन शास्त्रज्ञांचा समावेश या यादीत केलेला होता, त्यापैकी महर्षी चरक, सुश्रुत आणि पतंजली यांची नांवे वैद्यक क्षेत्रात सर्वश्रुत आहेत. चरकसंहितेवर आधारलेल्या आयुर्वेदातील नियमानुसार चालणारी चिकित्सापध्दती गुणकारी आहे आणि त्यामुळे लोकप्रियही आहे. सुश्रुताची शल्यचिकित्सा पध्दत अनुसरून आज तितक्याशा शस्त्रक्रिया केल्या जात नसतील, पण पंचकर्म आदि क्रिया करणारे वैद्य आहेत आणि ब-याच रुग्णांना त्यामुळे गुण येत आहे. पतंजलीने सांगितलेला योगाभ्यास तर फारच मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे. आधुनिक काळातील ताण तणावाच्या जीवनात तो खूपच उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे या तीन महान शास्त्रज्ञांच्या कर्तृत्वाबद्दल आदर आणि अभिमान वाटतोच वाटतो. ते तीघेही त्यांच्या स्वतःच्या कार्यानेच प्रख्यात आहेत. त्यांची तुलना कोठल्या पाश्चात्य शास्त्रज्ञाबरोबर करून त्यांचे कार्य मोठे आहे असे सांगण्याचा प्रश्नच उठत नाही.
इतर सात शास्त्रज्ञांची नांवे पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील त्यांच्या महान कार्याबद्दल घेतली जातात. तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता त्यांनी आपल्या ग्रंथात मांडलेले विचार थक्क करायला लावणारे आहेत. त्यांनी प्रतिपादन केलेले सिध्दांत त्या काळातील सर्वमान्य समजुतींना धक्का देणारे आहेत. पण ज्या प्रकाराने चरक, सुश्रुत आणि पतंजली यांचे सांगणे परंपरागत पध्दतीने
आपल्या पिढीपर्यंत पोचले आहे तसे या इतर शास्त्रज्ञांचे कथन आलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. मलासुध्दा या थोर शास्त्रज्ञांविषयी आदरभावना आहे, पण न्यूटन, कोपर्निकस, डाल्टन इत्यादी गेल्या कांही शतकातल्या शास्त्रज्ञांबरोबर त्यांची तुलना करून त्यांना मोठेपण देण्याचा प्रयत्न करणे मला प्रशस्त वाटत नाही.
आता मला मिळालेल्या पत्रातील मुद्याकडे वळू.
१. मुसलमान आणि इंग्रजांनी कित्येक जुने ग्रंथ, वैदिक वाङ्मय, मूर्ती, चित्रे वगैरे भारतीय संस्कृतीची उज्वल परंपरा दाखवणा-या सर्व गोष्टी नष्ट करण्याचा प्रयत्न केला नव्हता काय?
. . . . . होता ना! युध्दात विजयी झालेल्या आक्रमक सैनिकांची मनस्थिती विचारात घेतली तर त्यातला विजयाचा उन्माद, शत्रूबद्दल द्वेष व सूडभावना, निःशस्त्र नागरिकांवर वचक ठेवण्यासाठी दहशत बसवणे वगैरे कारणांमुळे ते विध्वंसक वृत्तीचे बनतात असे जगभर घडलेले आहे. फक्त मुसलमान आणि इंग्रजांनी फक्त हिंदू समाजावर अत्याचार केले होते अशातला भाग नाही. जर्मन, रशियन, जपानी आणि चिनी लोकांनी असेच वर्तन केल्याचे आपण गेल्या शतकात पाहिले आहे. परकीय आक्रमकांखेरीज स्थानिक असंतुष्ट लोकांनी रागापोटी केलेली जाळपोळ आणि कांही लोकांच्या स्वार्थापोटी घडत असलेला हिंसाचार याच्या बातम्या रोजच कुठून ना कुठून ऐकू येत असतात. त्याशिवाय नैसर्गिक कारणाने लागलेल्या आगी, पाऊस, महापूर, वाळवी, उंदीर वगैरे अनेक कारणांनी जुने ग्रंथ नष्ट होत असतात. गौतमबुध्द, महावीर किंवा पायथॅगोरस, प्लूटो आधी लोकांच्या काळातली हस्तलिखिते आता क्वचितच सापडतील, पण त्यांचे विचार इतर अनेक मार्गाने पसरले आहेत. महर्षी चरक, सुश्रुत आणि पतंजली यांची उदाहरणे आहेतच. तेंव्हा जे ज्ञान लोकांना पचते, रुचते, त्यांच्या मनाचा ठाव घेते ते त्याची पुस्तके जाळण्याने नाहीसे होत नाही असेच दिसते. शास्त्रीय संशोधनाविषयी जी माहिती आज आपणास मिळत नाही, जिच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह आहे, ती सगळी क्रूरकर्म्या आक्रमकांनी मुद्दाम नष्ट केली असे ठामपणे म्हणणे बरोबर नाही. जे संशोधन हजार पाचशे वर्षांनंतर पाश्चात्य शास्त्रज्ञ करून जगापुढे मांडणार होते नेमके त्यांच विषयांचे कागद निवडून पूर्वीच्या काळातल्या दुष्टांनी नाहीसे केले असे सांगणे कितपत तर्काला धरून आहे यावर विचार व्हायला हवा.

२. पाश्चात्य संशोधक महान होते खरे, पण त्यांच्या कार्याचा सुव्यवस्थित वृत्तांत देणारी सर्व जुनी कागदपत्रे पुढील पिढ्यांना तपासणी, विश्लेषण आणि अभ्यास करण्यासाठी उपलब्ध होती. आपल्या पूर्वजांच्या अगणित रचनांचा सखोल अभ्यास करण्याची चैन आपल्याला परवडण्यासारखी आहे काय?
. . . . हे शक्य नसेल त्यावर अवास्तव बोलण्याची काय गरज आहे?

३. जे लोक अशा प्रकारची (पूर्वजांची महती सांगणारी) विधाने करतात ते लोक काय काल्पनिक गोष्टी रचून सांगत आहेत काय? जे कांही थोडे फार वाङ्मय शिल्लक उरलेले आहे त्यात विज्ञानाच्या आणि कलेच्या प्रत्येक शाखेतील कित्येक शोधांचा (आधुनिक काळातील गोष्टींचा) उल्लेख येतो. फक्त ते सिध्दांत कशाच्या आधारावर कशा प्रकारे मांडले गेले होते याची माहिती तेवढी आता मिळत नाही. (म्हणून काय झाले? उल्लेख आला म्हणजे त्या गोष्टी प्रत्यक्षात असणारच!)
. . . .. . ललित वाङ्मय मुख्यतः कल्पनाविलासावरच आधारलेले असते. त्यात लिहिलेली प्रत्येक गोष्ट ही सत्यकथाच असली पाहिजे असा आग्रह धरून चालणार नाही. तसे असते तर शेक्सपीअरपासून आजपर्यंतच्या एकूण एक कथाकादंबरीकारांना आपण "खोटारडे" म्हणायला हवे.त्याचप्रमाणे वाङ्मयात उल्लेख आलेल्या गोष्टी सत्यात उतरलेल्या असतातच असे नाही. अरेबियन नाइट्समधले उडते गालिचे, लिलिपुटांचा देश किंवा इसापनीतीमधली बोलणारी जनावरे प्रत्यक्षात होती काय? आपण यांच्या गोष्टी किंवा परीकथा लहान मुलांना सांगतो तेंव्हा खोटे बोलणे हा आपला उद्देश असतो का? अशा प्रकारचे भारतीय संदर्भ मी मुद्दाम दिले नाहीत कारण कांही लोक त्यातले अक्षर न अक्षर काळ्या दगडावरली रेघ आहे असे मानतात.

४. आजची पिढी म्हणजे कांही मूर्खांचे टोळके नाही. आपल्या पूर्वजांनी जे कांही सांगितले ते सिध्द करण्याचे पुरावे आपल्यापाशी नसतील, पण त्यांची जी जनुके आपल्याकडे आहेत त्याच्या जोरावर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या लोकांनी नेत्रदीपक यश मिळवून जगाला दाखवले आहे.
. . . .. . . हे वाक्य सरळ सरळ वर्णभेदाचे समर्थन करणारे आहे. आज आपण दाखवत असलेल्या कौशल्याचा संबंध आपल्या पूर्वजांच्या रक्ताशी जोडण्याचा हा प्रयत्न मला मान्य नाही.

५. एक उदाहरण द्यायचे झाल्यास असे समजा की एका कुटुंबाकडे ५०० वर्षांपूर्वी अमाप संपत्ती आणि अचाट प्रतिभा होती. अचानक एक भूकंप आला आणि त्यात त्यांची सर्व संपत्ती तसेच कौशल्याची साक्ष देणा-या वस्तू नष्ट झाल्या. फक्त कांही माणसे त्यातून आश्चर्यकारक रीतीने वांचली आणि कुटुंबप्रमुखाच्या कांही दैनंदिन्यांची पाने शिल्लक राहिली. त्या कुटुंबातील आजच्या पिढीतील सुसंस्कृत, सुविद्य आणि
संपन्न स्थितीतील लोक आपल्या तथाकथित गतवैभवाचे रसभरित वर्णन करून सांगत असतील तर तुम्ही त्यांना काय म्हणाल?
अ) कुठल्याही पुराव्याशिवाय बेछूट विधाने करणारे ते मूर्ख आहेत,......... की
आ) कदाचित त्यांचे पूर्वज महान असतीलही. आजची तरुण मुले जर ज्ञान, संपत्ती, संस्कृती, कला वगैरे सर्व क्षेत्रात पुढे असतील तर त्यांचे पूर्वजही तसे असतीलच!
अ) एकाद्या भुसभुशीत वाळू असलेल्या जमीनीकडे बोट दाखवून इथे "आमच्या पूर्वजांची टोलेजंग इमारत होती ती भूकंपात नष्ट झाली" असे कोणी म्हणत असेल तर त्याला मी बहुधा "थापाड्या" म्हणेन कारण अशा प्रकारच्या जमीनीवर मोठी इमारत बांधता येईल याची मला खात्री वाटत नाही. तसेच कुठलीही इमारत भूकंपात एकदम अदृष्य होत नाही, तिचे भग्नावशेष, निदान पाया तरी शिल्लक राहतो
एवढे मला माहीत आहे.
आ) पण तो माणूस एवढ्यावर थांबत नाही. चाळीस पन्नास वर्षांपूर्वी उपलब्ध असलेले साहित्य वापरून इतर लोकांनी बांधलेल्या आणि सर्व लोकांना ज्याची चांगली माहिती आहे अशा आधुनिक पध्दतीच्या इमारतींकडे बोट दाखवून "त्यातले खांब, कमानी, दरवाजे वगैरे सगळे कांही माझ्या पूर्वजांनी बनवले होते. ते आपण तयार केले असल्याचे हे लोक खोटेच सांगत आहेत. या जुन्या काळातल्या कागदावर हे सगळे लिहिलेले आहे. तेंव्हा ते खरे असणारच." असे सांगू लागला तर मी त्याला कोण म्हणायचे? त्याच्या आजकालच्या कर्तृत्वाचे कौतुक करून त्याच्या दुराग्रहाचे समर्थन करायचे कां?

६. आपल्या पूर्वजांसंबंधी सांगितल्या जाणा-या गोष्टी आपण सिध्द करू शकत नसलो तरी त्या नव्हत्या असेही कुठे सिध्द करता येते? त्यामुळे अशा प्रकारच्या दाव्यांना नांवे ठेवण्याचे कांही कारण मला दिसत नाही.
.. . . .. . कुठलीही गोष्ट 'आहे' किंवा 'होती' हे कांही पुराव्यावरून सिध्द करता येते. ती 'नाही' किंवा ' नव्हती' असे सिध्द करता येणे जवळ जवळ अशक्य आहे. पण पुरेसा आधार नसतांनासुध्दा 'ती होती' असे म्हणणे मला मान्य नाही.
. . . . . . . . . . . (क्रमशः)

थोर भारतीय शास्त्रज्ञ (भाग २)

माझ्या विचारावर खालीलप्रमाणे एक प्रतिक्रिया आली.
१. मुसलमान आणि इंग्रजांनी कित्येक जुने ग्रंथ, वैदिक वाङ्मय, मूर्ती, चित्रे वगैरे भारतीय संस्कृतीची उज्वल परंपरा दाखवणा-या सर्व गोष्टी नष्ट करण्याचा प्रयत्न केला नव्हता काय?
२. पाश्चात्य संशोधक महान होते खरे, पण त्यांच्या कार्याचा सुव्यवस्थित वृत्तांत देणारी सर्व जुनी कागदपत्रे पुढील पिढ्यांना तपासणी, विश्लेषण आणि अभ्यास करण्यासाठी उपलब्ध होती. आपल्या पूर्वजांच्या अगणित रचनांचा सखोल अभ्यास करण्याची चैन आपल्याला परवडण्यासारखी आहे काय?
३. जे लोक अशा प्रकारची (पूर्वजांची महती सांगणारी) विधाने करतात ते लोक काय काल्पनिक गोष्टी रचून सांगत आहेत काय? जे कांही थोडे फार वाङ्मय शिल्लक उरलेले आहे त्यात विज्ञानाच्या आणि कलेच्या प्रत्येक शाखेतील कित्येक शोधांचा (आधुनिक काळातील सिध्दांतांचा) उल्लेख येतो. फक्त ते सिध्दांत कशाच्या आधारावर कशा प्रकारे मांडले गेले होते याची माहिती तेवढी आता मिळत नाही. ( म्हणून काय झाले? उल्लेख आला म्हणजे त्या गोष्टी प्रत्यक्षात असणारच!)
४. आजची पिढी म्हणजे कांही मूर्खांचे टोळके नाही. आपल्या पूर्वजांनी जे काय सांगितले ते सिध्द करण्याचे पुरावे आपल्यापाशी नसतील, पण त्यांची जी जनुके आपल्याकडे आहेत त्याच्या जोरावर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या लोकांनी नेत्रदीपक यश मिळवून जगाला दाखवले आहे.
५. एक उदाहरण द्यायचे झाल्यास असे समजा की एका कुटुंबाकडे ५०० वर्षांपूर्वी अमाप संपत्ती आणि प्रतिभा होती. अचानक एक भूकंप आला आणि त्यात त्यांची सर्व संपत्ती तसेच कौशल्याची साक्ष देणा-या वस्तू नष्ट झाल्या. फक्त कांही माणसे त्यातून आश्चर्यकारक रीतीने वांचली आणि कुटुंबप्रमुखाच्या कांही दैनंदिन्यांची पाने शिल्लक राहिली. त्या कुटुंबातील आजच्या पिढीतील सुसंस्कृत, सुविद्य आणि संपन्न
स्थितीतील लोक आपल्या तथाकथित गतवैभवाचे रसभरित वर्णन करून सांगत असतील तर तुम्ही त्यांना काय म्हणाल?
अ) कुठल्याही पुराव्याशिवाय बेछूट विधाने करणारे ते मूर्ख आहेत,......... की
आ ) कदाचित त्यांचे पूर्वज महान असतीलही. आजची तरुण मुले जर ज्ञान, संपत्ती, संस्कृती, कला वगैरे सर्व क्षेत्रात पुढे असतील तर त्यांचे पूर्वज तसे असतीलच!
६. आपल्या पूर्वजांसंबंधी सांगितल्या जाणा-या गोष्टी आपण सिध्द करू शकत नसलो तरी त्या नव्हत्या असेही कुठे सिध्द करता येते? त्यामुळे अशा प्रकारच्या दाव्यांना नांवे ठेवण्याचे कांही कारण मला दिसत नाही.

वर वर पाहता यातला युक्तीवाद कोणाला बिनतोड वाटेल. अशा प्रकारचा प्रचार अनेक माध्यमातून विशेषतः सुशिक्षित किंवा उच्चशिक्षित लोकांमध्ये सतत चाललेला असतो आणि बरेच लोकांवर त्याचा प्रभाव पडतो. यामुळे त्यावर योग्य दिशेने विचार करणे गरजेचे आहे.
. . . . . . . . . . . (क्रमशः)

Thursday, May 01, 2008

थोर भारतीय शास्त्रज्ञ (भाग १)

परवा मला एका मित्राच्या ईमेलबरोबर एक देखणा लेख आला. त्यात दहा थोर भारतीय शास्त्रज्ञ आणि त्यांची कार्यक्षेत्रे यांचे दर्शन घडवणारी सुरेख चित्रे देऊन त्याखाली थोडक्यात त्यांचा परिचय खालील क्रमाने दिला होता. या इंग्रजीतील लेखात दिलेल्या मथळ्यांचा मी जमेल तसा अनुवाद केला आहे. ज्या शब्दांना योग्य प्रतिशब्द आठवले नाहीत ते इंग्रजी शब्द तसेच ठेवले आहेत.
१. आर्यभट (इ.स. ४७६) महान खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ
२. भास्कराचार्य द्वितीय (इ.स. १११४-११८३) बीजगणितातले ' जीनियस'
३. आचार्य कणाद (इ.स.पूर्व ६००) अणुसिध्दांताचे आद्य प्रणेते
४. नागार्जुन (इ.स. १००) रसायनशास्त्रातले जादूगार
५. आचार्य चरक (इ.स.पूर्व ६००) वैद्यकीय शास्त्राचे जनक
६. आचार्य शुश्रुत (इ.स.पूर्व ६००) शल्यचिकित्सेचे जनक
७.वराहमिहिर (इ.स.४९९-५८७) खगोलशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी
८. आचार्य पतंजली (इ.स.पूर्व २००) योगशास्त्राचे जनक
९. आचार्य भारद्वाज (इ.स.पूर्व ८००) उड्डयनशास्त्राचे ' पायोनियर'
१०. आचार्य कपिल (इ.स.पूर्व ३०००) ' कॉस्मॉलॉजी' चे जनक
हा परिचय अगदी त्रोटक होता. यातील प्रत्येक शास्त्रज्ञाने अमूक तमूक कार्य केले आणि अमके अमके शोध लावले असे सांगून हे काम त्यांनी कोपर्निकस, न्यूटन, डाल्टन वगैरे पाश्चात्य शास्त्रज्ञांच्या हजार(रो) वर्षे आधीच केले होते असे लिहिले होते. हे सारे विद्वान थोर पुरुष होते, त्यांच्याकडे अचाट बुध्दीमत्ता व विचारशक्ती होती, अगाध ज्ञान होते आणि त्यांनी त्यांच्या काळात असामान्य असे कर्तृत्व करून
दाखवले यात शंका नाही. हा परिचय वाचल्यानंतर कोणाही सर्वसामान्य भारतीय माणसाला त्यांच्याबद्दल आदर वाटावा आणि स्वतःच्या भारतीयत्वाचा अभिमानही वाटावा असे वर्णन यात दिले होते.

पण विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आयुष्य घालवले असल्यामुळे हल्लीच्या युगात संशोधन कार्य कशा प्रकारे चालते ते मला थोडेसे जवळून पहायला मिळाले आहे. आभाळात विजा चमकाव्यात तशा कांही कल्पना मेंदूला सुचत असतात. त्यांवर सारासार विचार, सखोल अभ्यास, विचार विनिमय, प्रयोग, परीक्षण, निरीक्षण, मिळालेल्या माहितीचे वर्गीकरण, विश्लेषण, त्यातून निघणारी तात्पर्ये, त्यांचा इतर माहितीशी जुळत असलेला संदर्भ किंवा त्यांमधील विसंगती आणि त्यांचे स्पष्टीकरण, या सगळ्या गोष्टींचे सादरीकरण, त्यावर साधक बाधक चर्चा, तज्ञांचे अभिप्राय इत्यादी अनंत पाय-या चढून गेल्यानंतर कुठे त्यातून सर्वमान्य असा कांही निष्कर्ष काढला जातो. विविध उपकरणांनी सुसज्ज अशा प्रयोगशाळा, चांगली वाचनालये आणि भरपूर साधनसामुग्री यांचे पाठबळ असतांनासुध्दा हा प्रवास किती अवघड व खडतर असतो हे मी जवळून पाहिले आहे. इतक्या लोकांना कमालीच्या चिकाटीने आणि निष्ठेने जीव तोडून रात्रंदिवस काम करतांना पाहूनसुध्दा माझ्या माहितीतल्या एकाद्या प्रयोगशाळेत एकादा जगप्रसिध्द शोध लागलेला पाहण्याचे भाग्य कांही मला कधी लाभले नाही.

चारपांचशे वर्षांपूर्वी युरोपमध्ये शास्त्रीय संशोधन करणा-या शास्त्रज्ञांकडे फारशी साधनसामुग्री नसायची. जनतेचा पाठिंबा तर त्यांना मिळतच नव्हता, उलट अनेक वेळा विरोधच होत असे. त्यात कित्येकांच्या जिवावरदेखिल बेतले होते. अपमान, उपेक्षा, प्रसंगी छळ सहन करून आणि कळ काढून त्या लोकांनी जगाला थक्क करून सोडणारे शोध कसे लावले याच्या गौरवगाथा वाचायला मिळतात. त्या वेळी आपल्या देशात पूर्वीच्या काळात काय घडत असेल हा विचार ही मनात येतो. आपल्या सहिष्णु समाजाने कोणा शास्त्रज्ञाचा छळ केला नसेल, त्या विद्वानांना साजेसे आदराचे स्थानसुध्दा समाजात मिळत असेल. अशा चांगल्या वातावरणात त्यांना आपले संशोधनकार्य करायला अधिक वाव मिळावा अशी अपेक्षा आहे.
यामुळे त्या शास्त्रज्ञांच्या कार्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा वाटते. त्यांनी नेमके काय कार्य केले, म्हणजे कशाकशाचे निरीक्षण केले, त्यात कोणती माहिती त्यांना मिळाली, त्यांनी तिचे कसे विश्लेषण केले, त्यावरून कोणते निष्कर्ष काढले, त्यांनी प्रतिपादन केलेल्या सिध्दांतावरून कोणत्या इतर गोष्टींचे स्पष्टीकरण मिळते, तिथून पुढे कशी प्रगती झाली असे अनंत प्रश्न मनात उठतात. त्याबद्दल
कुतूहल निर्माण होते. बहुतेक सर्व पाश्चात्य शास्त्रज्ञांच्या बाबतीत अशा प्रकारची माहिती सुलभपणे उपलब्ध आहे. दुर्दैवाने प्राचीन काळातल्या भारतीय शास्त्रज्ञांबद्दल मात्र ती सहजासहजी मिळत नाही. सगळीकडे नुसती वर्णनात्मक विधाने सापडतात, त्यातली कांही बुध्दीला पटतात, कांही तितकीशी पटत नाहीत, असे मागे एकदा मी माझ्या लिखाणात नमूद केले होते. त्यावर "तुम्ही अशी शंकाच कशी घेता? गरज असेल तर अमक्या तमक्या पुस्तकसंग्रहालयात जाऊन जुने पुराणे संस्कृत ग्रंथ वाचून पहा." अशा प्रकारचे प्रतिसाद आले. अर्थातच मला हे दिव्य करण्याची तेवढी गरज नव्हती आणि सामर्थ्यही नव्हते. मी आपला क्षमा मागून मोकळा झालो.

सर आयझॅक न्यूटन यांनी मांडलेला गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत फक्त झाडावरून सुटलेले फळ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणशक्तीमुळे खाली पडते एवढेच सांगण्यापुरता मर्यादित नाही. गुरुत्वाकर्षणाची ही शक्ती नेमकी किती असते, ती कशाकशावर अवलंबलेली असते, त्यामुळे होणारे त्वरण, म्हणजे वाढत जाणारा वेग किती असतो, स्थिर असलेल्या, सरळ रेषेत जाणा-या किंवा घिरटी घालत असलेल्या गतिमान वस्तूंवर त्याचे काय परिणाम होतात वगैरे अनेक गोष्टी समीकरणामध्ये सूत्रबध्द करून मांडलेला तो अत्यंत महत्वाचा शास्त्रीय सिध्दांत आहे. पृथ्वीवरील जड वस्तू आणि आकाशातील ग्रह, तारे या सर्वांना समान त-हेने लागू पडणारा तो बहुधा पहिला शास्त्रीय सिध्दांत होता. निसर्गात असे कांही नियम असतील अशी कल्पना त्यापूर्वी कोणी करू शकत नव्हते. हा सिध्दांत मांडण्यापूर्वी न्यूटनने काय काय केले, कोणकोणती माहिती गोळा केली, त्यांची सांगड कशी घातली वगैरेबद्दल मी पूर्वी विस्ताराने लिहिले आहे. यातल्या इतर कोणत्याच गोष्टींचा थांगपत्ता नसतांना हा शोध आमच्या आचार्यांनी हजार वर्षांपूर्वी लावला होता असे विधान करण्यात कांही अर्थ नाही असे मला वाटते.

"पृथ्वी सर्व वस्तूंना स्वतःकडे ओढून घेते " अशा प्रकारचा विचार मनात येणे हे सुध्दा खरे तर कौतुकास्पद आहे. "पृथ्वी आणि वस्तू या दोघांमध्ये कोणतेही दृष्य बंधन नसतांना, त्यांना जोडणा-या कोठल्याही दोराशिवाय पृथ्वी त्या वस्तूला आपल्याकडे कसे ओढत असेल?" असेच सर्वसामान्य माणसाला वाटेल. पण असामान्य बुध्दीमत्ता असलेला शास्त्रज्ञ अशी कल्पना करू शकतो. त्या विचाराला पोषक अशी
उदाहरणे त्याला मिळाली असतील. त्यामुळे त्याला विचारांती आपल्या कल्पनेची खात्री पटली असेल व त्याने असे प्रतिपादन करायला सुरुवात केली असेल. त्यामुळे अशा प्रकारचा संदर्भ जुन्या ग्रंथात सापडत असेल. पण याचा अर्थ न्यूटनने केले सर्व विवेचन त्या विद्वानाने केले होते असा होत नाही. निव्वळ विचार किंवा कल्पना आणि परिपक्व संशोधन यात खूप मोठे अंतर असते. त्यातले निष्कर्ष इतर विद्वानांनी मान्य करून ते इतरांना सांगायला लागल्यानंतरच मूळ संशोधकाला त्याचे श्रेय मिळते असा विज्ञानाच्या जगातला पायंडा आहे. हे एक उदाहरण माझ्या माहितीतले आहे त्यामुळे सहज माझ्या लक्षात आले. इतर शास्त्रज्ञांबद्दल केलेली विधानेसुध्दा अशीच अवास्तव वाटतात.
. . . . . . . . . . . . . .. . . . . . (क्रमशः)

Wednesday, April 30, 2008

आनंदयात्रिकाला सलाम आणि प्रबोधनकर्त्याला दंडवत


आज महाराष्ट्रदिनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातल्या दोन महापुरुषांचा 'महाराष्ट्रभूषण' हा खिताब देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. या दोन्ही व्यक्ती महाराष्ट्राला भूषणभूत आहेत हे सर्वांना माहीतच आहे. कविवर्य मंगेश पाडगांवकर नेहमी प्रसिध्दीच्या झोतात असल्यामुळे त्यांचे नांव सर्व मराठीभाषिकाच्या चांगल्या परिचयाचे आहे, तर डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांनी प्रसिध्दीपासून दूर राहून समाजाचे प्रबोधन करण्याचे सेवाव्रत गेली चौसष्ठ वर्षे अव्याहतपणे चालवले आहे. त्यांनी सुरू केलेल्या कार्याचा वटवृक्ष आता जगभर फोफावला असल्यामुळे ज्यांनी त्या कार्यात सहभाग घेतला आणि ज्या लोकांना त्यापासून लाभ मिळाला अशा लोकांची संख्या फार मोठी आहे, त्यांना नानासाहेबांविषयी अत्यंत आदर वाटत असणारच, आज अभिमानाने त्यांना आनंदाचे भरते आले असेल.

महिनाभरापूर्वी मंगेश पाडगांवकरांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्यांच्या कांही उत्तमोत्तम काव्यपंक्तीतून त्यांच्याबद्दल लिहिले होते. त्यात भर टाकण्यासारखे खूप कांही असले तरी त्याबद्दल आज लिहिण्यापेक्षा डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांची ओळख करून देतो. त्यांच्या मागे गेली चारशेहे वर्षे समाजप्रबोधनाच्या कार्याची वंशपरंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनांव 'शेंडे' असे होते. त्यांच्या भूतकाळातल्या
आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शेंडे हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे. त्याकाळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने 'धर्माधिकारी' अशी पदवी दिली. तेंव्हापासून आजतागायत त्यांचे घराणे धर्माधिकारी हे आडनांव लावत आले आहेत आणि त्याला समर्पक असे धर्मजागृतीचे काम करीत आले आहेत.

डॉ.नानासाहेबांनी आपल्या पित्याकडून प्रेरणा घेऊन निरूपणाचे सेवाव्रत घेतले आणि ते अव्याहतपणे चालवले आहे. धर्माचरणाविषयी बोलतांना त्या अनुषंगाने अज्ञान, अंधश्रध्दा, भेदाभेद, व्यसनासक्ती, स्त्रियांवरील अत्याचार आदि दुष्ट प्रवृत्तींचे उच्चाटन करून समाजाला सन्मार्गाला लावण्याची शिकवण ते देत आले आहेत. या कामासाठी त्यांनी ६४ वर्षांपूर्वी श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती
स्थापन केली. त्याच्या शाखा आज भारताबाहेरील अनेक देशांपर्यंत पसरल्या आहेत. नानासाहेबांचे वय आता ऐंशीच्या घरात असून त्यांचे पुत्र श्री. अप्पासाहेब यांनी या समाजप्रबोधनाच्या कार्याची धुरा स्वतःच्या शिरावर घेतली आहे. अर्थातच त्यांनी आपल्या वडिलांच्याच निष्ठेने आणि तळमळीने हे व्रत अंगिकारले आहे हे सांगायला नकोच.

'महाराष्ट्रभूषण' या सरकारी पदवीमुळे नानासाहेबाच्या महत्तेत विशेष लक्षणीय अशी वाढ होवो वा न होवो, त्यांचे कार्य त्या विषयी अनभिज्ञ असलेल्या लोकांच्या समोर येऊन त्यांना यातून स्फूर्ती मिळाली तरी समाजाला त्याचा लाभ नक्कीच मिळेल. पाडरांवकरांचे काव्य तर कायमच मनाला तजेला देण्याचे कार्य करत असते. या दोघां विभूतींना सादर प्रणिपात.

Tuesday, April 29, 2008

मधुमती पन्नास वर्षांची झाली


मधुमती हा माझा अत्यंत आवडता चित्रपट प्रकाशित होऊन नुकतीच पन्नास वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाने त्या काळातले सिनेजगत पूर्णपणे जिंकले होते. १९५८ साली आलेल्या चित्रपटांची बहुतेक सगळी महत्वाची फिल्मफेअर एवार्ड्स मधुमतीने निर्विवादपणे पटकावली होती. त्याबद्दल कोणाला तक्रार करायला जागा नव्हती, कारण तो सिनेमा तसाच अफलातून बनला होता. कथानक, दिग्दर्शन, संगीत आणि मुख्य पात्रांचे अभिनय यातल्या कशाच्या तरी आधारावर सर्वसाधारणपणे कोणताही सिनेमा चालतो. मधुमतीमध्ये या सगळ्याच गोष्टी अत्युत्कृष्ट दर्जाच्या होत्या, त्यांशिवाय अर्थपूर्ण गीतांतली शब्दरचना, उपकथानके, विनोदनिर्मिती, आटोपशीरपणा वगैरे साऱ्या गोष्टी छान जमल्या होत्या आणि तांत्रिक बाजूसुध्दा भक्कम होत्या. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम एक अप्रतिम असा चित्रपट निर्माण
होण्यात झाला.

काळोखी रात्र, त्यात मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट अशा भयाण वातावरणात सिनेमा सुरू होतो. कथानायक आपल्या मित्राबरोबर आडरानातल्या रस्त्यावर मोटारीतून जात असतांना अचानकपणे त्या वादळात तो सांपडतो. रात्रभर मुक्कामासाठी विसावा शोधत ते दोघे एका जुन्यापुराण्या हवेलीत शिरतात. त्या ओसाड पडलेल्या वाड्यातल्या पुराणवस्तू नायकाला ओळखीच्यावाटायला लागतात. अशा रहस्यमय गूढ वातावरणाने सुरुवात होत असतांनाच त्यातून जन्मजन्मातरीच्या आठवणीचे
'असंभव' कथानक समोर येते. असे असले तरी सुरुवात आणि शेवटाचा थोडा भाग वगळता उरलेला सिनेमा मुख्यतः एका हळुवार प्रेमकथेच्या भोंवतीच फिरत राहतो.

ईशान्य भारतातल्या निसर्गरम्य दृष्याने नायकाच्या आठवणीचा फ्लॅशबॅक सुरू होतो. पक्ष्यांची किलबिल, मेंढरांचे आवाज, मेंढपाळाची लकेर वगैरे ध्वनींमधून वातावरणाची निर्मिती होत असतांनाच मुकेशच्या आवाजात "सुहाना सफर है ये मौसम हँसी" हे गोड आणि खटकेदार गाणे सुरू होते. त्यातल्या "हमें डर है हम खो न जाये कहीं" या ओळीत जी आशंका नायक व्यक्त करतो ती खरी ठरते. त्या क्षणापासून नायकाबरोबर प्रेक्षकसुध्दा त्या वातावरणात स्वतःला हरवून जातात.

नायक आपल्या चहाच्या मळ्यातल्या नोकरीवर रुजू होतो तेंव्हाच त्याला त्या मळ्याच्या सीमा दांखवून त्यापलीकडे शत्रुपक्षाची जागा आहे, तिथे पाय ठेवणे सुध्दा धोक्याचे आहे हे सांगितले जाते. पण रानातून फिरत असतांना त्याला पलीकडून एका अत्यंत आवाजातील गाण्याचे आर्त शब्द ऐकू येतात, "आ जा रे परदेसी, मै तो कबसे खडी इस पार, अँखियाँ थक गयी पंथ निहार". मधुमती येण्यापूर्वीच महल या चित्रपटातील "आयेगा आनेवाला" या गीताने अशा प्रकारच्या गूढ गाण्यांची परंपरा सुरू झाली होती आणि त्यानंतर आलेल्या बहुतेक रहस्यपटात असे एक हाँटिंग साँग दिले गेले. "कहीं दीप जले कहीं दिल, जरा देख ले आके परवाने", "नैना बरसे रिमझिम रिमझिम, पिया तोरे आवनकी आस", "तेरेबिन जिया उदास रे, ये कैसी मनहूस प्यास रे", "गुमनाम है कोई, बदनाम है कोई" वगैरे कित्येक गाणी अजरामर झाली आहेत. अगदी अलीकडे आलेल्या भूलभुलैया मध्ये अशाच प्रकारचे "तुमी जे शुमार" हे श्रेयाने गायिलेले अप्रतिम गाणे आहे. पण यातील कोणाचीही "आ जा रे परदेसी"ला तोड होऊ शकत नाही.

या गाण्याने मंतरलेल्या अवस्थेत नायक आपली सीमा पार करून 'उस पार' जातो. तिथे त्याची नायिकेशी भेट होते आणि छोट्या छोट्या प्रसंगांतून ती वाढत जाते. "जुल्मीसंग आँख लडी रे, सखी मैं का करूँ, जाने कैसी ये बात हुई रे" अशी गोड तक्रार लोकगीताच्या शैलीत नायिका आपल्या मैत्रिणींपुढे करते तर दोघेही प्रेमी "दिल तडप तडपके कह रहा है आ भी जा, तू हमसे आँख ना चुरा, तुझे कसम है आ भी जा" असे एकमेकांना सांगतात. 'कसमे वादे' वगैरे होऊन गेल्यावर मीलनाचा क्षण नजरेसमोर दिसायला
लागल्यावर "घडी घडी मोरा दिल धडके, हाय धडके, क्यूँ धडके, आज मिलनकी बेला आयी, फिर ये नजरियाँ क्यूँ फडके" या गाण्यात मीलनाची आतुरता व्यक्त करतांनाच मिळणा-या कांही अशुभ संकेतांमुळे आलेली मनाची व्याकुलता नायिका मांडते. या गाण्याची अशी गंमत आहे की याचीच चाल "आजारे परदेसी"या गाण्यात इंटरल्यूड म्हणून वापरली आहे, किंवा ती इंटरल्यूड इतकी आवडली की तिच्या चालीवर स्वतंत्र गाणे रचावेसे वाटले असेही म्हणता येईल.

या प्रेमकथेमध्ये सुध्दा नेहमीप्रमाणेच दोन मुख्य अडथळे आहेत. नायिकेचा अक्राळविक्राळ दिसणारा आडदांड बाप पहिल्यांदा त्यांच्या प्रेमात खो घालतो. अशा रासवट आणि रागीट बापांनाच नाजुक, सुंदर, कोमलांगी, मृदुभाषिणी कन्यका व्हाव्यात असा एक अजब अलिखित संकेत हिंदी चित्रपटांमध्ये पाळतात. श्रीमंत, बदफैली, व्यसनी, उध्दट, बलदंड असा खलनायक नायिकेच्या मागावर असतोच. या दोघांशीही प्रत्यक्ष लढून त्यांना नामोहरम करण्याएवढी शारीरिक कुवत नायकाच्या अंगात नसते आणि त्याने तसा प्रयत्न केल्याचे स्टंटसीनही दिग्दर्शकाने उगाच टाकलेले नाहीत. प्रथम नायिका आपल्या बापाची समजूत घालते आणि नंतर नायक आपल्या 'सच्चाई'ने त्याचे मन वळवतो. खलनायकाच्या कपटकारस्थानापुढे मात्र त्याची सपशेल हार होते. सिनेमा संपण्याला बराच वेळ शिल्लक असतांनाच नायिकेचा अंत झालेला पाहून प्रेक्षक अस्वस्थ होतो.

विरहाने व्याकुळ झालेला नायक "टूटे हुवे ख्वाबोंने हमको ये सिखाया है, दिलने जिसे पाया था आँखेंने गँवाया है" असा विलाप करत निरर्थक रीत्या इतस्ततः भटकत असतांनाच योगायोगाने अगदी नायिकेसारखाच चेहेरा मोहरा असलेली दुसरीच एक मुलगी त्याच्या समोर येते. एका सांस्कृतिक कार्यक्रमात तिने सादर केलेले "दैया रे दैया रे चढ गयो पापी बिछूवा" हे गाणे पाहिल्यानंतर त्याच्या मनात एक प्लॅन जन्म घेतो. मधुमती पूर्वी आणि नंतर येऊन गेलेल्या अनेक चित्रपटात मी अनेक प्रकारचे फोक डान्सेस पाहिले आहेत, पण आजही सामूहिक आदिवासी नृत्य म्हणताच माझ्या डोळ्यांसमोर दैया रे दैया शिवाय दुसरे कोणतेही गाणे उभे रहातच नाही.

जॉनी वॉकरने आपली हास्यमय भूमिका मस्त वठवली आहे. "जंगलमें मोर नाचा किसीने ना देखा, हम जो थोडीसी पीके जरा झूमे तो हाय रे सबने देखा" हे एक दारुड्याचे विनोदी गाणे त्याच्या पात्रावर चपखल बसवले आहे. "हम हालेदिल सुनायेंगे, सुनिये के न सुनिये" हा एक मुजरा देखील गोष्टीत कुठे तरी बसवला आहे.

डुप्लिकेट नायिकेला अचानकपणे समोर दाखवून खलनायकाची हबेलंडी उडवावी आणि त्याच्याकडून कबूली जबाब मिळवून त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळवून द्यावी असा बेत रचून नायक तसा प्रसंग घडवून आणतो आणि त्यात नाट्यमय घटना घडून रहस्यमय रीतीने गोष्टीवर अखेरचा पडदा पडतो. अशा प्रकाराने मिळवलेल्या कबूलीजबाबाच्या आधारावर कोणा अपराध्याला न्यायालयात शिक्षा होईल असे मात्र आज वाटत नाही. चारचौघांसमोर उघड उघडपणे गुन्हा करून त्याचा भरभक्कम पुरावा असतांनासुध्दा गुन्हेगाराच्या केसालाही धक्का पोचत नाही असेच अलीकडे येऊन गेलेल्या कित्येक सिनेमात पहायला मिळते. एवढा फरक गेल्या पन्नास वर्षात आपल्या समाजव्यवस्थेत पडला आहे.

दिलीपकुमार आणि वैजयंतीमाला हे नायक नायिका म्हणून मधुमती येण्याआधीच प्रस्थापित झालेले कलाकार होते. मधुमती हे आणखी एक नांव त्यांच्या अविस्मरणीय भूमिका असलेल्या चित्रपटांच्या यादीत ठळक अक्षरात जोडले गेले. प्रत्येक भूमिकेत नवनव्या लकबी दाखवून त्यांची कंटीन्यूइटी दाखवायचे कसब प्राण हा गुणी नट कसे करू शकतो देव जाणे. मधुमतीतला त्याचा खलनायकी रोल लक्षात राहण्याइतक्या सफाईने त्याने वठवला आहे. निर्माता व दिग्दर्शक बिमल रॉय आणि संगीत दिग्दर्शक सलिल चौधरी हे दोघेही या सिनेमाने कलाविष्काराच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन पोचले. त्यांनी पुढे अनेक चित्रपट काढले पण मधुमतीचे स्थान अढळपदावर राहिले.

असा हा चित्रपट निघून पन्नास वर्षे होऊन गेली असली तरी अजून तो पुन्हा पहावासा वाटतो. सीडीचा शोधसुध्दा लागला नव्हता त्या काळातल्या या सिनेमाच्या सीडी आजही बाजारात मिळतात आणि खपतात. 'आजारे परदेसी' हे गाणे गेली पन्नास वर्षे माझ्या दहा आवडत्या गाण्यात आपली जागा राखून आहे. वेळोवेळी प्रसिध्द होणाऱ्या मोठ्या लोकांच्या टॉप टेनमध्येही मी हे गाणे अनेक वेळा पाहिले आहे. मधुमती हा सिनेमा हीच हिंदी सिनेसृष्टीतली ही एक अजरामर अशी कृती आहे.

Sunday, April 27, 2008

लीड्सच्या चिप्स - भाग २० - कुटुंबसंस्था

आपल्या भारतात पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती. पिढ्यानपिढ्या एका मोठ्या कुटुंबातील माणसे एकत्र रहात असत. शेती तसेच व्यवसायांमधील त्यांची उत्पन्नाची साधनेही समाईक असत. दुष्काळ व पुरासारख्या नैसर्गिक आपत्ती आणि आक्रमणे, लढाया वगैरे बाह्य कारणामुळेच त्यातील कांही लोकांना गांव सोडून जावे लागत असे. क्वचित कधी अगदीच पटेनासे झाले तर भावंडे वाटणी करून वेगळी होत किंवा कोणी घर सोडून चालला जात असे, पण होईल तोवर एकत्रच रहायचा प्रयत्न होत असे. नोकरीसाठी शहरात येऊन स्थाईक झाल्यावर तिथे जागा अपु-या पडायला लागल्या तसेच उत्पन्नाची साधने वेगवेगळी झाल्याने लोक वेगळ्या चुली मांडू लागले. कुटुंबाची मर्यादा फक्त आई वडील व मुले एवढ्यापर्यंत संकुचित झाली. विभक्त कुटुंब पद्धत आल्यानंतरही बहुतेक अविवाहित मुले अजून आपल्या आईवडिलांच्या बरोबरच राहतात. मुलाचे लग्न होऊन त्याचा नवा संसार सुरू झाल्यानंतरसुद्धा त्याचे आई वडील त्याच्याबरोबर रहात असल्याचे अनेक घरात दिसते. त्यामुळे आजी आजोबा व नातवंडे एकत्र असल्याचे दृष्य नेहमी पहायला मिळते. काका, मामा, मावशी, आत्या तसेच चुलत, मावस, आते मामे भावंडे एकमेकांबरोबर संपर्कात असतात व लग्नासारख्या प्रसंगी आवर्जून उपस्थित राहतात. अशा प्रकारे आपले नातेसंबंध बळकट असतात.

पाश्चिमात्य देशात मात्र कुटुंबसंस्था कदाचित आपल्याइतकी मजबूत कधी नसावीच. काका, मामा वगैरे सगळे अंकल आणि काकू, आत्या वगैरे ऑंटी. सख्खी सोडून इतर सगळी भावंडे कझिन्स असा त्यांचा उल्लेख होत असे. ते फारसे एकत्र कधी रहातच नसत. दुस-या महायुद्धानंतरच्या काळात समाजात जी प्रचंड उलथापालथ झाली, धर्माचा प्रभाव नाहीसा झाला, व्यक्तीस्वातंत्र्याला महत्व प्राप्त झाले, त्यात कुटुंबसंस्था चांगलीच ढासळली आहे. मुलाला घराण्याचे नांव मिळेल तसेच मुलगा घराण्याचे नांव उज्ज्वल करेल या जुन्या संकल्पना कालबाह्य झाल्या. मुलाच्या जन्माच्या वेळी त्याच्या आई व वडिलांनी लग्न करून एकत्र रहात असण्याची गरज उरली नाही. तो मोठा होऊन सज्ञान बनेपर्यंत ते एकत्र राहतीलच याची शाश्वती नाही. तोपर्यंत ते वेगवेगळे होऊन त्यांनी निरनिराळ्या जोडीदारांबरोबर संसार थाटलेले असण्याचीही शक्यता असते. मग मुलांनी त्यातल्या कुणाबरोबर रहायचे?

आईवडिलांपासून वेगळे रहायची संवय तर त्यांना अगदी बालपणापासून लावली जात असते. त्यांना कळायला लागण्यापूर्वीच त्यांच्यासाठी वेगळी खोली सुसज्ज करून ठेवलेली असते. त्यांचे उठणे, बसणे, खेळणे, अगदी झोपणेसुद्धा या स्वतंत्र खोलीमध्ये होत असते. सज्ञान झाल्यानंतर सहजगत्या नोकरी मिळते आणि ती न मिळाल्यास सरकारकडून पुरेसा बेकारभत्ता मिळतो. त्यामुळे शालेय शिक्षण संपता संपता मुले आपली रहाण्याची वेगळी सोय करून घेतात. मात्र व्यवस्थित स्वतंत्र घर थाटण्याइतपत सुस्थिती आल्यानंतरच ते लग्नाचा विचार करतात. मी असे ऐकले की आईवडीलसुद्धा मुलाला भेटायला येतात तेंव्हा त्याच्या घरी पाहुण्यांसाठी वेगळी खोली असेल तर ठीक आहे, ते तिथे राहतात. ती सोय नसेल तर सरळ हॉटेलात झोपायला जातात.

कांही वर्षापूर्वी मी लंडनला गेलो असतांना दिवसभर इकडे तिकडे भटकून झाल्यावर संध्याकाळी एका भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या चार बेडरूम असलेल्या प्रशस्त बंगल्यात त्यांना भेटायला गेलो होतो. दिवसा ते घरी भेटलेच नसते. ते जोडपे मुंबईला आमच्याकडे आलेले असतांना त्यांनी आपल्या बंगल्याचे तोंडभर वर्णन करून मला आपल्याकडे येण्याचा आग्रह केला होता म्हणून मी मुद्दाम वाकडी वाट करून त्यांच्याकडे गेलो होतो. मी सातासमुद्रापलीकडून आलेला असल्यामुळे मला निदान रात्रभर वस्तीला त्यांच्याकडे रहायला सांगणे त्यांना भाग होते. त्यांची टीनेजमधली तीन मुले अजून त्यांच्याकडेच रहात होती. त्यामुळे त्यांच्या सगळ्या बेडरूम्सची वाटणी झालेली होती. माझी झोपण्याची व्यवस्था दिवाणखान्यातल्या सोफ्यावर करण्यात आली. लंडनच्या संस्कृतीमध्ये वाढलेली तीन्ही मुले वेगवेगळ्या ठिकाणी, बहुधा पबमध्ये संध्याकाळ घालवून रात्री एक एक करून परतली व आपापल्या बेडरूममध्ये जाऊन झोपली. कां कोणास ठाऊक, पण ती बहुधा सर्कसमधल्या पिंज-यात ठेवलेल्या प्राण्याकडे पहावे तसे सोफ्यावर पहुडलेल्या माझ्याकडे जाता जाता पहात आहेत असे मला राहून राहून वाटत होते. यालाच बहुतेक कल्चर शॉक म्हणत असावेत. कारण आमच्या घरी जर दूरचे पाहुणे आले तर हॉलमध्येच सगळ्यांच्या पथा-या पसरून निवांतपणे गप्पा मारल्या जातात. यात कुटुंबातील सगळ्यांची भेट होते, आपुलकी निर्माण होते वगैरे. इथे तर साधी ओळख करून घेण्याची इच्छा कोणाला झाली नव्हती. दुस-या दिवशी सकाळी मुले उठण्य़ापूर्वीच माझे महत्वाचे काम असल्याचे निमित्त सांगून मी तेथून सटकलो आणि तडक हॉटेल गाठले.

लीड्सला एका ख्रिश्चन कुटुंबात एका छोट्याशा पार्टीला जायचा योग आला. तिथे भारतीय तसेच इंग्लिश असे दोन्ही वंशांचे पाहुणे आले होते. एक सत्तरीला आलेले इंग्लिश जोडपेही होते. त्यातील बाई कुटुंबव्यवस्थेला लागलेल्या उतरंडीबद्दल खूपच जिव्हाळ्याने बोलत होत्या. त्यांची मुले कुठकुठल्या दूरच्या देशात रहात असावीत, फार क्वचितच त्यांची भेट होत असे. त्यांनी लग्ने केली होती किंवा नव्हती याची कल्पना नाही. बोलता बोलता दुसरा एक इंग्रज बोलून गेला, "आजकालच्या आईवडिलांच्या मनात आपल्या वयात आलेल्या मुलांबद्दल फक्त एकच अपेक्षा असते. ती म्हणजे त्यांनी लग्न करावे, तेही मुलाने मुलीबरोबर आणि मुलीने मुलाबरोबर."

Saturday, April 26, 2008

एप्रिल फुले


एप्रिल महिन्याची सुरुवात 'एप्रिल फूल' ने होते. संभावितपणाचा आव आणून एकादी लोणकढी थाप मारायची, कोणाला तरी गंडवायचे आणि त्याला जो फसेल त्याची टर उडवायची. पण हे सगळे अगदी माफक प्रमाणात. त्यापासून कोणी दुखावले जाणार नाही, कोणाला नुकसान किंवा इजा पोचणार नाही, त्यात आपला लाभ तर नाहीच नाही एवढी काळजी घेत ती मस्करी करायची.

एवढा थोडा मजेचा भाग सोडला तर लहानपणची एप्रिल महिन्याची मुख्य आठवण म्हणजे वार्षिक परीक्षा. त्या काळात बॉलपेनचा शोध लागला नव्हता. फाउंटन पेन वापरण्यावर बंदी होती. पेनमुळे अक्षर बिघडते अशी समजूत होती. शिवाय त्या काळात महागडे वाटणारे पेन आणि त्याहून महागडी त्याची खास स्पिरिटमधली शाई यांची चैन गरीब मुलांना परवडण्यासारखी नव्हती. यामुळे शाळेतले रोजचे लिहिणे शिसपेनने करायचे आणि परीक्षेसाठी दौत टांक न्यायचा अशी रीत होती. एक पैशाला शाईची पुडी मिळायची आणि एक किंवा दोन पैशाला टांकाचे नवे निब. एका आण्यात अशी वार्षिक परीक्षेची तयारी करायची.

शाळेत मास्तरांनी शिकवतांना जेवढे कानावर पडले असेल, त्यातले जेवढे लक्षात राहिले असले तर असले. त्याच्या पलीकडे वर्षभर घरात फारसा अभ्यास असा केलेला नसायचा. वार्षिक परीक्षेच्या आधी मात्र मान मोडून सर्व विषयांची उजळणी करायची आणि ते ज्ञान परीक्षेच्या पेपरात भडाभडा ओकून मोकळे व्हायचे. शेवटचा पेपर लिहून परत येतायेताच कुठेतरी दौत फोडून टाकायची आणि टांक भिरकावून द्यायचा इतका त्यांचा वीट आलेला असे. पुढले सहा महिने तरी त्यांची गरज पडायची नाही.

वार्षिक परीक्षा संपली की मुलांच्यासाठी मे महिन्याची सुटी सुरू होऊन जाई. त्यामुळे हुंदडायला आणि खेळायला सारा दिवस मोकळा असायचा. मध्येच एक दिवस रिझल्टसाठी शाळेत जावे लागायचे पण मला तरी त्याचे बिलकुल टेन्शन नसायचे. 'हुशार' विद्यार्थ्यात गणना होत असल्यामुळे नापास व्हायचा प्रश्नच नव्हता. पहिल्या दुसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धाही नव्हती. तीन चार मुलांपैकी कधी कोणाला कधी कोणाला आलटून पालटून ते नंबर मिळायचे. त्यांना कसलेही बक्षिस नसायचे त्यामुळे ते मिळाल्याचा आनंदही नव्हता किंवा हुकल्याचे दुःखही नसायचे.

कांही झाडांना वर्षभर फुले लागतात तर कांही फुले फक्त त्यांच्या ठराविक मोसमांत येतात एवढे पाहून माहीत होते. बहुतेक झाडे पावसाळ्यात जोमाने वाढायची आणि प्रसन्नपणे फुलायची, त्यातली कांही दसरा दिवाळीकडे बहराला यायची. पण एप्रिल महिन्याचा फुलांबरोबर कसला संबंध नव्हता. आमच्याकडल्या कुठल्याच फूलझाडांना एप्रिलमध्ये बहर येत नव्हता. आंब्यालाही त्यापूर्वीच मोहोर येऊन गेलेला असायचा. मुंबईला आल्यावर निसर्गाशी असलेला प्रत्यक्ष संबंध तुटला होता. गुलाबाची आणि झंडूची फुले बाजारात इथे वर्षभर मिळतात. सणावारांच्या सुमारास त्यांची किंमत वाढते, पण त्याचा आर्थिक संबंध पुरवठ्याशी नसून मागणीशी आहे एवढे अर्थशास्त्र समजत होते.

इंग्लंडमध्ये थंडीच्या दिवसात बर्फाच्छादित निसर्ग पाहिला. त्या काळात झाडांना फूल येणे तर सोडा, त्यांची बहुतेक सगळी पाने सुध्दा गळून पडलेली असतात. ते पाहिल्यानंतर त्यांच्या स्प्रिंगमध्ये येणाऱ्या बहराचे महत्व जाणवले. मार्च महिन्यात बर्फ वितळायला सुरुवात होऊन त्याखाली दबलेली झाडे नव्या पल्लवीने ताजी तवानी होतात आणि मार्च अखेर ती प्रफुल्लित होतात. चेरीची झाडे फुलांनी झाकून जातात आणि रंगीबेरंगी दिसू लागतात.ट्यूलिपसारख्या फुलांची शोभा कांही औरच असते. ती पहाण्यासाठी हॉलंडमध्ये विस्तीर्ण बगीचे बनवले आहेत. त्यात वेगवेगळ्या जातींची ट्युलिप्सची झाडे लावून व वर्षभर खतपाणी घालून त्यांची काळजीपूर्वक निगा राखली जाते. मार्च एप्रिलमध्ये त्यांना अपूर्व असा बहर येतो आणि तो पाहण्यासाठी जगभरातून कोट्यवधी पर्यटक गर्दी करतात. मागच्या एप्रिल महिन्यात आम्हाला ही संधी मिळाली. त्या अनुभवाचे वर्णन मी माझ्या ग्रँड युरोप वरील ब्लॉगमध्ये केले होते.

आता अशा प्रकारच्या बागा देशोदेशी तयार केल्या जाऊ लागल्या आहेत. युरोप सहलीत आम्हाला सर्वच देशात छोट्या छोट्या आकाराच्या ट्युलिपच्या बगीचांचे दर्शन घडत होते. त्याशिवाय कुठे रस्त्यांना दुभागणाऱ्या बेटात ट्यूलिपच्या फुलांची रांग दिसे तर कुठे हॉटेलच्या रिसेप्शन कौंटरकवर ती फुले सुंदर फुलदाणीत सजवून ठेवलेली दिसत. काश्मीरच्या सुप्रसिध्द मुगल गार्डन्समध्ये कांही भागात ट्यूलिपची फुले लावली असल्याचा वृत्तांत वर्तमानपत्रात वाचला होता. आता अमेरिकेत राहणाऱ्या भाचीने तिथल्या ट्यूलिप फेस्टिव्हलची छाया चित्रे पाठवली आहेत. कदाचित हॉलंडमधील बागांपेक्षाही तिथली शेते अवाढव्य आकाराची असावीत. नाही तरी अमेरिकन लोकांना आकाराच्या मोठेपणाचे भारी कौतुक आहे. क्षितिजांपर्यंत पसरतांना दिसणारी एकसारख्या रंगांच्या फुलांची रांग खरेच मुग्ध करून सोडते.

Friday, April 25, 2008

लीड्सच्या चिप्स - भाग १९ - वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता


पूर्व आणि पश्चिम हे कधीच एकमेकांना भेटणार नाहीत, इतक्या त्यांच्या संस्कृती भिन्न आहेत, असे किपलिंगसाहेब सांगून गेले, पण जगाच्या पूर्व आणि पश्चिम भागात राहणारी माणसे एकमेकांना भेटतच राहिली व त्यांच्या आचारविचारात बरीच देवाणघेवाण होत गेली. कांही बाबतीत मात्र त्यांच्या वागणुकीमधील ठळक फरक तसेच राहिले. वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता ही त्यातलीच एक गोष्ट आहे. आंघोळ करण्याला आपल्याकडे फारच महत्व आहे. अनेक लोकांना सकाळी उठल्या उठल्याच आंघोळीचे वेध लागतात. आंघोळ केल्याशिवाय कसलेही अन्नग्रहण न करणारी माणसे आहेत. संध्याकाळी घरी परतल्यानंतर कांही लोक पुन्हा एकदा सचैल स्नान करून देहशुद्धी करून घेतात. देह घासून पुसून स्वच्छ करणे हा आंघोळीमागील सर्वात महत्वाचा उद्देश असतो. तसेच आंघोळ करून झाल्यावर धुतलेले स्वच्छ कपडे परिधान करणे आवश्यक असते. इंग्लंडमध्ये वेगळी परिस्थिती आहे. तिथल्या थंड हवेत अंगाला घाम येत नाही. रस्त्यामध्ये धूळ नसते, त्यामुळे ती उडून अंगाला चिकटत नाही. चेहरा सोडून सर्वांग कपड्याने झाकलेले असल्यामुळे ती शरीरापर्यंत पोचतही नाही. त्यामुळे शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आंघोळ करण्याची गरज भासत नाही. गरम पाण्याचा शॉवर घेऊन किंवा गरम पाण्याने भरलेल्या टबात आरामात बसून शरीराला ऊब आणणे हा आंघोळ करण्यामागील मुख्य उद्देश असतो. त्यामुळे सवड मिळेल त्याप्रमाणे आठवड्यातून एखाद्या दिवशी आंघोळीची चैन केली तरी पुरते. अंगावर घातलेले कपडे फारसे मळत नाहीत, त्यांना कुबट वास येत नाही व धुतलेले कपडे लवकर वाळत नाहीत या सगळ्या कारणामुळे तेही रोजच्या रोज बदलण्याची गरज वाटत नाही.
आपल्याकडे पूर्वापारपासून पायातील चपला दाराच्या बाहेर काढून ठेवण्याची पद्धत होती. त्यानंतर अंगणामध्ये पाय स्वच्छ धुवून घरात प्रवेश करायचा रिवाज होता. कालांतराने राहती घरे लहान होत गेली व दरवाजाच्या बाहेर ठेवलेल्या चपला चोरीला जाऊ लागल्या त्यामुळे त्या घरात आणून सर्वात बाहेरील दारापाशी ठेऊ लागले. टू बीएचके, थ्री बीएचके फ्लॅट्स आल्यानंतर कांही लोकांच्या घरी पायात बूट घालून दिवाणखान्यापर्यंत येणे क्षम्य मानले जाऊ लागले. पण त्यापुढे स्वयंपाकघरात मात्र अजूनही कोणी जात नाही.
इंग्लंडमध्ये हिंवाळ्यात पायाखालील जमीन बर्फाच्या लादीसारखी थंडगार झालेली असते, कधीकधी तर त्यावर बर्फाचा थरही साठलेला असतो. त्यामुळे "पादस्पर्शम् क्षमस्वमे" म्हणण्याला ती बधत नाही. तिच्यावर अनवाणी चालल्यास ती पायच काय सारे शरीर गोठवून बधीर करून टाकते. त्यामुळे चोवीस तास पायात मोजे चढवलेले तर असतातच, पण झोपणे सोडून इतर वेळी पायातील बूटसुद्धा फारसे काढले जात नाहीत.
आपल्याकडे सचैल स्नान करून शुचिर्भूत झाल्याखेरीज कोठलेही धार्मिक कृत्य सुरू करता येत नाही. तसेच ते करतांना कसलेही पादत्राण घातलेले चालत नाही. पायातील जोडे, चपला बाहेर काढून ठेवल्याशिवाय देवळात प्रवेश करता येत नाही. दक्षिण भारतातील कांही देवळात तर उघड्या अंगानेच जावे लागते. इंग्लंडमध्ये असला कसलाच विधीनिषेध नाही. तुम्ही पारोशा अंगाने व पायातील बूट न काढता चर्चच्या कोठल्याही भागात फिरू शकता व तिथे जाऊन प्रार्थना करू शकता. गंमत म्हणजे आपण शुभकार्य करतांना डोक्यावर पागोटे किंवा टोपी घालतो तर तिकडे चर्चमध्ये आंत गेल्यानंतर डोक्यावरील हॅट काढून हातात घेतात.
पूर्वीच्या काळी घराबाहेरील अन्न खाणेसुद्धा निषिद्ध होते. त्यामध्ये स्वच्छता सांभाळण्याचा हेतू असावा असा माझा अंदाज आहे. सगळे लोक प्रवासाला जातांना आपापले जेवणखाण घरी बनवून आपल्याबरोबर बांधून नेत असत. मध्यंतरीच्या काळात ही बंधने बरीच शिथिल झाली होती. आता संसर्गजन्य रोगांच्या भीतीने पछाडले गेल्यामुळे पुन्हा एकदा लोक घरी शिजवलेल्या सात्विक व निर्जंतुक खाण्याला प्राथमिकता देऊ लागले आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ठेल्यावरील पदार्थ खाणे टाळू लागले आहेत. हवेत धूळ नसली तरीसुद्धा उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे इंग्लंडमध्ये पूर्वीच बंद झाले होते. पण रोज घरी स्वयंपाक करणेही कमीच. बेकरीमध्ये किंवा मोठ्या भटारखान्यात तयार केलेल्या असंख्य प्रकारच्या खाद्यवस्तू हवाबंद पॅकिंग करून विकायला ठेवलेल्या असतात. त्या घरी नेऊन मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये तापवायच्या आणि खायच्या ही सर्वमान्य पद्धत झाली आहे. त्यात पुन्हा हस्तस्पर्शविरहित यासारखे सोवळे प्रकार असतात. भाज्या सुद्धा प्लॅस्टिकच्या पिशव्यात बंद असतात. त्यात "हिरवी (ग्रीन)" म्हणजे रासायनिक खते व जंतुनाशके न वापरता पिकवलेली भाजी. पण जमीनीतून उगवलेली ताजी भाजी पाहिजे असेल तर स्वतःचेच किचन गार्डन हवे. सर्वसामान्य लोक असले फरक करीतच नाहीत. जे कांही स्वस्त व मस्त असेल ज्याची "डील" लावली असेल त्यावर उड्या मारतांना दिसतात.
व्यक्तिगत जीवनात आपल्याइतकी शरीराची "स्वच्छता" न सांभाळणारे इंग्रज लोक सार्वजनिक जागा मात्र कमालीच्या स्वच्छ ठेवतात. रस्त्यावर थुंकणे, नाक शिंकरणे अजीबात नाही, इतर विधींचा प्रश्नच येत नाही. भटकी कुत्री नसतात. गाई बैल गावाबाहेर गोठ्यात
असतात. गोपूजनासाठी एक गाय वाघसिंह ठेवायच्या पिंज-यात घालून बंदोबस्तात आणलेली मी पाहिली. रस्त्यामध्ये तसेच सर्व सार्वजनिक जागांवर आकर्षक कचराकुंडे ठेवलेली असतात. आपल्याकडील कचरा त्यात टाकायची संवय लोकांना लालगलेली आहे. घराघरातील कचरा ठराविक प्रकारच्या काळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या थैलीत घालून तमजल्यावरील एका खोलीत किंवा जवळच्या सार्वजनिक कचराकुंडात नेऊन ठेवायचा. रोज कचरा वाहून नेणारी गाडी येऊन यंत्राच्या सहाय्याने तो उचलून घेऊन जाते. रस्त्यावर दिसणारी घाण म्हणजे मुख्यतः झाडांची गळून पडलेली पाने असतात. त्यामुळे बाहेर जाऊन आल्यावर लगेच पायातील बूट काढून टाकावेत असे वाटावे इतके ते किळसवाणे वाटत नाहीत.
एकदा मी कुत्र्याला सोबत घेऊन फिरणा-या एका ललनेचे लक्षपूर्वक निरीक्षण केले. ती मुलगीसुद्धा सर्व तयारीनिशी फिरायला आली होती. तिकडच्या कुत्र्यांच्या संवयी मात्र भारतातील कुत्र्यांच्यासारख्याच आहेत. कुत्र्याने आपले काम करताच तिने शांतपणे आपल्या पिशवीतून टॉयलेट पेपरचा रोल काढला, ती जागा स्वच्छ करून ते कागद जवळच्या कच-याच्या कुंडात टाकल्यानंतर ती पुढे गेली.
भारतातील कोणतीही मुलगी हे नुसते ऐकूनच ईईईईई करेल!

लीड्सच्या चिप्स - भाग १८ - थॅकरेज मेडिकल म्यूझियम


शत्रूचा संहार करण्यासाठी वापरात येणा-या विनाशकारी शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करणारे रॉयल आर्मरीज वस्तुसंग्रहालय जसे लीड्स येथे आहे तसेच माणसाचा प्राण वाचवण्यासाठी वैद्यकीय तंत्रज्ञानाची जी धडपड सुरू आहे तिचे सम्यक दर्शन घडवणारे थॅकरेज मेडिकल म्यूझियमसुद्धा त्याच गांवात आहे. इसवी सन १९९७ मध्ये उघडलेल्या या संग्रहालयाने दरवर्षी इंग्लंडमधील 'म्यूझियम ऑफ द ईअर' हा बहुमान आपल्याकडे ठेवला आहेच, त्याशिवाय 'म्यूझियम ऑफ द युरोप' हा सन्मानसुद्धा पटकावला आहे. वैद्यकीय शास्त्रात व संबंधित तंत्रज्ञानात गेल्या दोन अडीचशे वर्षात कशी प्रगति होत गेली याचा माहितीपूर्ण तसेच कधी मनोरंजक तर कधी चित्तथरारक वाटणारा आढावा या ठिकाणी घेतला आहे. मात्र रॉयल आर्मरीजमध्ये संपूर्ण जगातील शिकारी व युद्धाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तसे इथे नाही. इथला सगळा प्रपंच मुख्यतः लीड्सच्या आसपासचा परिसर, युरोपमधील काही भाग इतक्याच प्रदेशापुरता मर्यादित आहे. जर्मनीमध्ये विकसित झालेली होमिओपथीसुद्धा त्यात अंतर्भूत नाही. प्राचीन काळापासून चालत आलेल्या आयुर्वेद, युनानी किंवा चिनी वैद्यकाचा साधा उल्लेखसुद्धा नाही. वेगवेगळ्या काळात त्या भागात राहणा-या लोकांच्या अंधश्रद्धा, आरोग्यासंबंधी असणारे त्याचे अज्ञानमूलक गैरसमज वगैरे सुद्धा संपूर्ण जगाचे प्रातिनिधिक म्हणता येणार नाहीत. त्यातील कांही गोष्टी आपल्याला ओळखीच्या वाटतात, कांही चमत्कारिक वाटतात.
लीड्स येथील सेंट जेम्स या प्रमुख हॉस्पिटलच्या आवारातीलच एका वेगळ्या इमारतीत हे म्यूझियम आहे. बाहेरून त्याचा सुगावा लागत नाही. आपल्या जे.जे.हॉस्पिटलप्रमाणेच या हॉस्पिटलचे आवार अवाढव्य असून अनेक इमारतींमध्ये विखुरलेले आहे. त्यात नव्या जुन्या सगळ्या प्रकारच्या बिल्डिंग्ज आहेत. रस्त्यावरील पाट्या व दिशादर्शक खुणा वाचत शोधतच तिथे जोऊन पोचलो. तिकीट काढून प्रवेश करतांक्षणी उजव्या हांताला एक दरवाजा लागतो. इथे लहान मुलांना प्रवेश निषिद्ध आहे. हृदय कमकुवत असलेल्या मोठया माणसांनीसुद्धा आंत जाण्याचा धोका पत्करू नये असे ठळक अक्षरात लिहिले आहे. त्यामुळे आपले हृदय धडधाकट आहे असे लहान मुलांना दाखवण्यासाठी त्यांना बाहेर थांबवून सज्ञान मंडळी आंत जातात.
तिथे एकच शो दर पांच मिनिटांनी पुन्हा पुन्हा दाखवतात. आधी सभागृहात अंधार गुडुप होताच आर्त संगीताच्या लकेरी सुरू होतात. अठराव्या शतकातील एक दृष्य पडद्यावर येते व खर्जातील घनगंभीर आवाजात कॉमेंटरी सुरू होते. त्यात सांगतात की हॅना डायसन नांवाच्या एका दहा अकरा वर्षाच्या मुलीला अपघातात झालेल्या व चिघळून सडू लागलेल्या जखमेचे विष तिच्या अंगात भिनू नये यासाठी तिच्यावर आता शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्या काळात भूल देणे नसतेच. भीतीनेच अर्धमेली झालेली ती पोर कण्हत असते. चारी बाजूंनी तिचे हातपाय करकचून आवळून धरतात. ती आणखीनच जोरात टाहो फोडते. कसायासारखा दिसणारा डॉक्टर हांतात सुरा पाजळत येतो आणि एका घावात तिचा पाय कापून वेगळा करतो. ती पोर जिवाच्या आकांताने किंचाळते आणि थंडगार पडते. एकदम भयाण नीरव शांतता पसरते. त्यानंतर कॉमेंटरीमध्ये सांगतात की या भयानक शस्त्रक्रियेनंतरसुद्धा तिच्या जगण्याची शक्यता कमीच असते. बरेचसे रुग्ण त्या धक्क्याने हृदयक्रिया बंद पडून दगावतात तर अनेक लोक त्यातून होणारा रक्तस्राव सहन करू शकत नाहीत. ज्यांच्या नशीबाची दोर बळकट असेल असे थोडेच लोक यातून वाचतात. पण इतर मार्गाने त्यांना वाचवणे अशक्य झालेले असते तेंव्हाच नाइलाजाने शस्त्रक्रिया केली जाई.
पुढे जाऊन आपण एका गुहेत प्रवेश करतो. त्यापूर्वीच वेगवेगळ्या कागदावर वेगवेगळ्या व्यक्तीची नांवे लिहून ठेवलेल्या चतकोर कागदांचे सातआठ गठ्ठे ठेवलेले दिसतात. समोर मोठ्या फलकांवर त्या व्यक्तींची थोडक्यात माहिती लिहिलेली असते ती पाहून आपण निवड करावी व आपल्याला वाटतील तितके कागद उचलून हातात धरावेत. ही सारी माणसे दोनशे वर्षापूर्वीच्या काळातील लीड्सची रहिवासी होती. कदाचित ती काल्पनिक असतील किंवा प्रत्यक्षात होऊन गेलेलीही असतील. त्यात कोणी बालक, कोणी वृद्ध, कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी ऐशोआरामात रहाणारे तर कोणी काबाडकष्ट करणारे असे होते. त्या सर्वांना वेगवेगळ्या व्याधी जडलेल्या असतात एवढेच समान सूत्र. पुढे गेल्यावर त्या सर्वांचे प्रत्यक्ष दर्शन होते. त्या काळातील घरे, घरातील सामानसुमान, आजूबाजूचा परिसर कुठे स्वच्छ, कुठे गलिच्छ आणि त्यात बसलेली, उभी किंवा झोपलेली आजारी माणसे ही सगळी दृष्ये अप्रतिम कलात्मकतेने पण अत्यंत वास्तववादी वाटावीत अशी उभी केली आहेत. त्या काळातील घरामधील उजेड किंवा काळोख, नाकात घुसणारे सुवास किंवा उग्र दर्प, कानावर आघात करणारे विचित्र ध्वनि, गोंगाट वगैरे सगळे कृत्रिम रीतीने निर्माण करून ते दृष्य आपल्याला खरोखरच त्या भूतकाळात घेऊन जाते.
प्रत्येक रोग्यावर त्या काळानुसार कोणकोणते उपचार होण्याची शक्यता तेंव्हा होती याचे पर्याय त्या त्या ठिकाणी एकेका फलकावर मांडलेले होते. प्रत्येकासाठी त्या काळात लागणारा अंदाजे खर्च त्यापुढे लिहिला होता. एक दृष्य पाहून पुढे जाण्यापूर्वी रोगाचे गांभीर्य व रोग्याची आर्थिक क्षमता यांचा विचार करून त्यामधील आपल्याला जो बरा वाटेल तो निवडून आपण हातातील कागदावर तशी खूण करून ठेवायची. या प्रकारे आपणसुद्धा भावनिक रीत्या त्या गोष्टीत गुंततो. त्या रोग्यांना जडलेला रोग कशामुळे झाला असावा याबद्दल तत्कालिन लोकांची जी कल्पना असेल त्याप्रमाणेच उपचार ठरणार. बहुतेक लोकांना तो ईश्वरी कोप वाटायचा. कुणाला भूतबाधा, चेटूक, करणी वगैरेचा संशय यायचा तर कांही लोकांना अन्नातून विषबाधा झाली असेल किंवा एखादा विषारी पशु किंवा कीटक चावल्याची शंका यायची. रोगजंतु व विषाणूंचा शोध अजून लागला नव्हता. प्रारब्ध, पूर्वसंचित वगैरै गोष्टी हा त्यांच्या संस्कृतीचा भाग नाही.
जसे रोगाचे निदान होईल त्यानुसारच उपचारसुद्धा होणार. त्यामुळे चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करणे, साधुसंतांचा आशीर्वाद घेणे, चेटकिणीकडून करणीवरील उतारा मिळवणे, गळ्यात किंवा दंडावर तावीज बांधणे, अंगावर, कपड्यावर किंवा भिंतीवर एखादे चिन्ह काढणे, गाव सोडून दुसरीकडे जाऊन राहणे, खाण्यापिण्याचे पथ्य पाळणे, डॉक्टरकडे जाऊन त्यांची अत्यंत महागडी औषध घेणे वगैरे पर्याय असत. डॉक्टरांची औषधेसुद्धा विविध खनिज रसायने आणि प्राणीजन्य व वनस्पतीजन्य पदार्थांचे परंपरा व अनुभव यानुसार केलेले मिश्रण असायचे. पूर्वानुभव व अनुमान धपक्याने ते दिले जायचे. त्याने गुण आला तर आला, नाहीतर रोग्याचे नशीब. इतक्या तपासण्या करून, वैज्ञानिक दृष्टीने विचारपूर्वक निदान करून व कार्यकारणभाव जाणून घेऊन आजकाल औषधयोजना केली जाते तरीही हे विधान ओळखीचे वाटते. या परिस्थितीत अजूनही आमूलाग्र बदल झाला आहे असे वाटत नाही. महाराणी व्हिक्टोरियाच्या काळातील त्यांतील प्रत्येक रोग्याचे प्रत्यक्षात शेवटी काय झाले याची उत्कंठा म्यूझियमतून बाहेर पडण्यापूर्वी शमवली जाते.
गुहेतून बाहेर पडल्यावर आपण वस्तुसंग्रहालयाच्या मुख्य दालनात जातो. सुरुवातीला असे दिसते की लीड्समध्ये राहणा-या एका डॉक्टरने आरोग्य व स्वच्छता यातील परस्परसंबंध सर्वात आधी दाखवून दिला. 'लुळीपांगळी श्रीमंती आणि धट्टीकट्टी गरीबी' ही अतिशय चुकीची कल्पना आहे. उंदीर, माश्या, पिसवा यांचा सुळसुळाट असलेल्या, सांडपाण्याचा निचरा होत नसलेल्या गलिच्छ वस्त्यांमध्ये रोगराई फैलावण्याचे प्रमाण प्रचंड आहे. बंगल्यामध्ये राहणारे अमीर उमराव त्या मानाने निरोगी असतात. हे सगळे त्याने आकडेवारीनिशी मांडले व नगरपालिकेने यात लक्ष घालून नगराच्या दरिद्रनारायणांच्या भागातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे याचा पाठपुरावा केला. घाण आणि रोगराई यातील प्रत्यक्ष संबंध कशा प्रकारे जुळतो हे त्याला सांगता येत नव्हते, पण तो निश्चितपणे आहे असे त्याचे ठाम मत होते व ते प्रत्यक्ष पुराव्यानिशी त्याने दाखवून दिले.
त्यानंतर एडवर्ड जेन्नर व लुई पाश्चर प्रभृतींनी वेगवेगळे रोगजंतु सूक्ष्मदर्शक यंत्रातून आधी स्वतः पाहिले आणि जगाला दाखवले. तसेच ते मानवी शरीरात गेल्यामुळे संसर्गजन्य आजार होतात हे सिद्ध केले. हवेवाटे फुफ्फुसात, अन्नपाण्यावाटे जठरात व त्वचेवाटे किंवा तिला झालेल्या जखमांमधून रक्तप्रवाहात ते प्रवेश करतात आणि त्याच्या प्रादुर्भावामुळे शरीरात निरनिराळे रोग निर्माण होतात हे समजल्यावर त्यावर प्रतिबंधक उपाय शोधणे शक्य झाले. अनेक प्रकारची जंतुनाशक रसायने तसेच रोगप्रतिबंधक लशींचा शोध लागत गेला. दुस-या महायुद्धकाळात सापडलेल्या पेनिसिलीनने या दिशेने एक महत्वाचा टप्पा गाठला व प्रभावी रोगजंतुनाशकांचा एक नवा वर्ग निर्माण केला. श्वसन, अन्नपचन, रक्ताभिसरण आदि मानवी शरीराच्या मूलभूत क्रिया तसेच अस्थि, मांस, रक्त, मज्जा आदि शरीराच्या घटकांबद्दल जसजशी अधिकाधिक माहिती समजत गेली तसतसे रोगांचे स्वरूप समजत गेले व त्यावरील उपाययोजना करणे वाढत गेले हा सगळा इतिहास विविध चित्रे आणि प्रतिकऋतींच्या माध्यमातून सुरेख व मनोरंजक पद्धतीने मांडला आहे.
शल्यक्रिया आणि मुलाचा (किंवा मुलाची) जन्म या दोन विशिष्ट विषयासंबंधी माहिती देणारी खास दालने आहेत. या दोन्हीमध्ये गेल्या दोनशे वर्षात कसकसे बदल होत गेले, त्यात आधी आणि नंतर घेण्याची काळजी, क्रिया सुरू असतांना कसली मदत लागते, कोणत्या आधुनिक सुविधा आता उपलब्ध आहेत वगैरे कालानुक्रमे व सविस्तर दाखवले आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तान्ह्या बाळाचा मऊ स्पर्श, गरोदरपणामुळे शरीरावर पडणारा ताण वगैरेंची कृत्रिम प्रात्यक्षिके ठेवली आहेत. वाढत्या लहान मुलांचे संगोपन, त्यांना होऊ शकणारे आजार व त्यापासून दूर राहण्यासाठी बाळगायची सावधगिरी वगैरे एका दालनात दाखवल्या आहेत.
डॉक्टरी पेशासाठी लागणारी थर्मॉमीटर व स्टेथोस्कोपासारखी साधने, शल्यक्रियेसाठी लागणारी आयुधे, एक्सरे फोटोग्राफी, सोनोग्राफी आदि यांत्रिक साधनांचीही थोडक्यात ओळख करून दिली आहे. या वस्तुसंग्रहाच्या जोडीनेच या आवारात अशा सहाय्यक वस्तूंची तसेच वैद्यकशास्त्रावरील पुस्तकांची विक्री सुद्धा होते. तसेच या विषयावरील तज्ञांचे परिसंवाद वर्षभर सुरू असतात. अशा प्रकारच्या विविध उपक्रमांमुळे त्यावर होणारा खर्च भरून निघतो तसेच मानवजातीची एक प्रकारे सेवाच घडते. असे हे एक वैशिष्ट्यपूर्ण आगळे वेगळे वस्तुसंग्रहालय लीड्सच्या वास्तव्यात पहाण्याची संधी मिळाली.

Wednesday, April 23, 2008

श्रीरामाची उपासना

विश्वातील चराचरात भरून राहिलेल्या निर्गुण निराकार परमेश्वराची आराधना आणि उपासना करणे कठीण असते. यामुळे ती असंख्य दृष्य प्रतिमांच्या स्वरूपात केली जाते. विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय सांभाळणारी ब्रम्हा, विष्णू व महेश ही त्रिमूर्ती आणि आदिशक्ती ही ईश्वराची प्रमुख रूपे धरली तरी प्रसंगोपात्त इतर अनेक रूपांमध्ये देव प्रकट झाला किंवा त्याने अवतार घेतला याच्या सुरस कथा आपल्या धार्मिक वाङ्मयात आहेत. अंबरीषासाठी भगवान विष्णूचे जे दहा अवतार झाले त्यातील मत्स्य, कूर्म वगैरेंबद्दल कोणाला फारसे कांही माहीत नसते, किंवा त्यांची मंदिरे सहसा दिसत नाहीत, राम आणि कृष्ण हे दोन अवतार विशेष प्रसिध्द आणि लोकप्रिय आहेत. आपले जीवन रामाने किती व्यापून टाकले आहे हे आपण मागील भागात पाहिले होते. त्याच्या उपासनेबद्दल थोडे या भागात पाहू.

परंपरेने चालत आलेल्या समजुतीनुसार रामनामाचा जप केल्याने माणसाच्या सर्व पापांचे क्षालन होते, त्याचे दैन्य, दुःख वगैरे नाहीशी होतात आणि अंती तो भवसागर पार करतो अशी भाविकांची दृढ श्रध्दा असते. "रामनामाने शिळा उध्दरल्या." या कथेवर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. आपला उध्दार होण्याच्या इच्छेने श्रध्दाळू लोक जमेल तेंव्हा जमेल तितके वेळा तोंडाने रामनाम घेतात. बरेच लोक "श्रीराम जयराम जयजयराम" या मंत्राचा नियमितपणे एकशे आठ किंवा हजार वेळा जप करतात. वेळी प्रसंगी लक्ष किंवा कोटी वेळा या नामाचा जप करण्याचे किंवा अखंड नामस्मरणाच्या सप्ताहासारख्या उत्सवाचे आयोजन केले जाते

' सेतुबंधन' , ' पुष्पक विमान' वगैरे सर्व पौराणिक संकल्पना शंभर टक्के सत्य होत्या असे मानणारा सुशिक्षित किंवा उच्चशिक्षित लोकांचा एक नवा वर्ग मला भेटतो. या लोकांनी विज्ञानाचे शिक्षण घेतलेले असते पण आर्किमिडीज, न्यूटन वगैरे शास्त्रज्ञांनी मांडलेल्या सिध्दांतांपेक्षा या लोकांचा पुराणांतील कथांवर जास्त विश्वास असतो. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी एवढी प्रगती केलेली होती की त्यांना हे साध्य होते असे त्यांना ठामपणे वाटते. विज्ञानातील चार शब्दांचा उपयोग करून "रामनामाच्या उच्चारातून ज्या ध्वनिलहरी उठतात त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ती घरभर पसरून कानाकोप-यातल्या ऋण ऊर्जेला हुसकून लावते. याच लहरी शरीरातील रक्ताभिसरण वाढवतात, छातीचे ठोके नियमित करतात, रक्तदाबावर नियंत्रण ठेवतात. एकंदरीतच शरीर, मन आणि आत्मा यांचे शुध्दीकरण करतात." वगैरे अनेक 'शास्त्रीय' गुण हे लोक रामनामाला जोडतात. पण भक्तीमार्गाने जाऊन रामाचे नामस्मरण करतांना मी त्यांना फारसे पाहिले नाही.

दिवेलागणी झाल्यावर घरातली सारी मुले एकत्र बसून रामरक्षा म्हणत. त्यामुळे सगळ्या संकटांपासून संरक्षण मिळते, सर्व मनोकामवना पूर्ण होतात वगैरे सांगितले जात असले तरी तसा तेवढा प्रत्यक्ष अनुभव येत नव्हता. त्या वयात मनातल्या इच्छा पूर्ण होण्याची वाट पहायला धीर नसतो. आंबा खावा असे वाटले की अल्लाउद्दीनच्या दिव्यातल्या राक्षसाप्रमाणे कोणीतरी तो हांतात आणून द्यायला हवा तर त्याचा कांही उपयोग! पायापासून डोक्यापर्यंत एकेका अवयवाचे नांव घेऊन त्याचे संरक्षण राम करो अशी रोज प्रार्थना करीत असलो तरी ठेचकाळणे, खोक पडणे, ताप, खोकला, पोटदुखी वगैरे जे कांही व्हायचे ते होतच असे. त्या वयात पापक्षालन, मोक्ष, मुक्ती वगैरेंचे आकर्षण वाटायचेच नाही. तरीही एक मजेदार कारण पटत असे. त्या लहान गांवात कांही पडकी ओसाड घरे होती, अनेक जुनाट वृक्ष होते आणि रात्री काळोखाचे साम्राज्य असे. त्यात "हा खेळ सांवल्यांचा" चालत असे. वा-याच्या झुळुकीबरोबर पाने हालत आणि कुठला तरी नादही त्याबरोबर कधी वहात येत असेल. त्यामुळे अनेक प्रकारचे भास कोणाला तरी होत आणि त्याची वर्णने तिखटमीठ लावून पसरली जात. अमक्या झाडावर मुंजा आहे, दुसरीकडे हडळ आहे, कुठे बांगड्यांची किणकिण ऐकायला येते तर कुठे पैंडणांची छुमछुम अशा प्रकारच्या गोष्टी नेहमीच कानावर पडत असे. असल्या अगोचर शक्तींवर रामरक्षा हा रामबाण उपाय होता. त्यामुळे भक्तीभावाने नसली तरी भीतीपासून मुक्ती मिळवण्यासाठी रामरक्षा म्हंटली जात असे.

आमच्या गांवात शंकराची अनेक देवालये होती. मारुती, गणपती, विठोबा, दत्त वगैरें देवांची एकाहून जास्त देवळे होती. घतातील वडील मंडळींपैकी कोणी ना कोणी दर सोमवारी शंकराच्या, गुरुवारी दत्ताच्या, शुक्रवारी अंबाबाईच्या आणि शनिवारी मारुतीच्या दर्शनाला नियमितपणे जात. एकादशीला विठ्ठल आणि संकष्टीला
गणपतीच्या देवळात जाणे ठरलेले असे. तिथे जाऊन कुणापुढे नारळ फोडणे, कुठे ओटी भरणे, कुठे तिथल्या दिव्यात तेल घालणे, कुठे अभिषेक करवणे वगैरे विधी अधून मधून होत असत. गांवात रामाचे मंदीरसुध्दा होते, पण त्याचे दर्शन घेण्याचा कुठला वार किंवा तिथी ठरलेली नव्हती. रामनवमीच्या सोहळ्याखेरीज
एरवी कधी रामाच्या देवळात गेल्याचे मला आठवत नाही. घरातल्या देवांच्या सिंहासनात इतर अनेक मूर्ती होत्या, रांगणारा बाळकृष्णसुध्दा होता, पण रामाची मूर्ती कांही नव्हती. नाही म्हणायला दिवाणखान्यात अनेक देव देवता, साधुसंत आणि पूर्वजांच्या फोटोबरोबर रविवर्म्याने काढलेले रामपंचायतनाचे फ्रेम केलेले चित्र होते. पण कधी त्याला हार घातलेला आठवत नाही. एकंदरीत आमच्या घरातल्या रोजच्या पूजाअर्चेच्या विधीमध्ये रामाचा समावेश नव्हता. माझ्या ओळखीत तरी मी तो कोणाकडे पाहिला नाही. आमच्या गांवातले राममंदीर आणि नाशिकचे काळा राम व गोरा राम वगळता इतर कुठल्या गांवातले राममंदीरसुध्दा मला पाहिल्याचे स्मरणात नाही. मुंबईला गिरगांवात मराठी लोकांचे आणि माटुंग्याला मद्रासी लोकांचे अशी रामाची मंदिरे आहेत असे नुसते ऐकले आहे.

उत्तर भारतात गोस्वामी तुलसीदासांच्या रामचरितमानसाचे खूप महत्व आहे. अनेक लोक त्याची पारायणे सारखी करत असतात. कांही लोकांना ते तोंडपाठ आहे. रामचरितमानसातल्या दोह्यांवर आधारलेले सवाल जवाब किंवा अंताक्षरीचे कार्यक्रमदेखील होतात इतके ते सर्वश्रुत आहे. महाराष्ट्रात इतके लोकप्रिय रामायणाचे पुस्तक नाही. आमच्या घरी रामविजय नांवाची एक पोथी होती ती माझ्या आईला अत्यंत प्रिय होती. एकादे कथाकादंबरीचे पुस्तक कुठेही, केंव्हाही बसून किंवा पडल्या पडल्या संवडीने वाचता येते, मधला कंटाळवाणा भाग वाटल्यास वगळता येतो किंवा ते पुस्तक वाचणेच अर्धवट सोडता येते. तसे पोथीच्या बाबतीत करता येत नाही. तिचे पारायण करायचे झाल्यास सचैल स्नान करून पाटावर बसून त्यातील अक्षर अन् अक्षर स्पष्ट उच्चार करीत वाचायचे असते. सुरू केलेला अध्याय मध्येच सोडता येत नाही आणि सुरू केलेले पारायण पूर्ण करून त्याची विधीवत यथासांग समाप्ती करावी लागते. लहान मुलांना हे सगळे शक्य नसल्याने मला ती पोथी वाचायची फारशी संधी मिळाली नाही. पण जेवढी श्रवणभक्ती करता येणे शक्य झाले त्यावरून त्या पोथीत रामाच्या चरित्राची गोष्ट अत्यंत रसाळ शब्दात
सांगितली आहे एवढे नक्की. रामनामाचा जप, रामरक्षा आणि या पोथीच्या पारायणाखेरीज रामाची अन्य कोणती उपासना आमच्या घरी होत नव्हती.

रामदासस्वामी पूर्णपणे रामभक्त होते. त्यांना जगात चोहीकडे श्रीरामाचे दर्शन होत होते. कंबरेवर हात ठेऊन उभ्या असलेल्या पंढरपूरच्या विठोबाला पाहून त्यांनी " इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा" असे विचारले होते. पण त्यांनीसुध्दा रामची मंदिरे उभी करण्याऐवजी हनुमंताची देवळे बांधून त्यातून जनतेचे
बलसंवर्धन करण्यासाठी प्रचार केला असे दिसते. आजही गांवागांवात जेवढी मारुतीची देवळे दिसतात तेवढी श्रीरामाची दिसत नाहीत.

Sunday, April 20, 2008

लीड्सच्या चिप्स - भाग १७ - रॉयल आर्मरीज म्यूझियम


लीड्स शहराच्या लोकवस्तीच्या मानाने तेथे जास्तच वस्तुसंग्रहालये आहेत. कदाचित बाहेरून येणा-या पर्यटकांना आकर्षित करणे हा त्यामागील एक उद्देश असेल असे ती प्रदर्शने पाहणा-या प्रेक्षकांना पाहिल्यावर वाटते. या सर्वात रॉयल आर्मरीज म्यूझियम अव्वल नंबरावर खचित येईल. आपल्या मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियमची भव्य वास्तु त्यापेक्षा आकाराने मोठी आहे. ग्वाल्हेर, बडोदा, म्हैसूर व जयपूरच्या राजेरजवाड्यांनी केलेले संग्रह विलक्षण आहेत, पुण्याच्या राजा केळकर वस्तुसंग्रहालयात वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक गोष्टी पहायला मिळतात, इंग्लंडमधील लंडनचे टॉवर म्यूझियम तसेच बर्मिंगहॅम व एडिंबरा येथील म्यूझियम्स वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत तसेच प्रेक्षणीय आहेतच. पण या सर्व म्यूझियम्समधील सारी शस्त्रास्त्रे एकत्र आणली तरीही लीड्सच्या 'रॉयल आर्मरीज'ची सर त्यांना येणार नाही. इतर ठिकाणी फक्त ऐतिहासिक काळातील वस्तु दिसतील पण या ठिकाणी आदिमानवाने वापरलेल्या अणकुचीदार दगडापासून इराकमधील युद्धात उपयोगात आणलेल्या अत्याधुनिक अस्त्रापर्यंत सगळ्यांचे अनेक रूपात दर्शन घडते.
लीड्स येथे आयर नदी व तिच्या समांतर वाहणारा कृत्रिम कालवा या दोन्हींच्या बेचक्यात या म्यूझियमची आधुनिक ढंगाची चार मजली इमारत उभी आहे. एका कोप-यावर कांचेचा पारदर्शक टॉवर आहे. कट्यार खंजीरापासून पिस्तुल बंदुकीपर्यंत हातात धरून चालवायची शेकडो हत्यारे त्यात वरपासून खालपर्यंत आंतल्या बाजूला चोहीकडे अत्यंत कलात्मक रीतीने टांगून ठेवली आहेत. पुन्हा त्यातील प्रत्येकाचा आकार वेगळा आहे. खालून वरून किंवा कोठल्याही मजल्याला जोडणा-या मार्गिकेतून पाहिल्यास त्याच्या भव्य देखाव्याने डोळे दिपून जातात.
प्रत्येकी दोन मुख्य मजले व दोन उपमजले अशी त्या चार मजल्यांची रचना आहे. चारही मजल्यावर अनेक हॉल आहेत. प्रत्येक हॉलच्या भिंतींच्या कडेकडेने मोठमोठ्या कपाटात प्रेक्षणीय वस्तु मांडून ठेवल्या आहेत. मुख्य मजल्यांच्या हॉल्सच्या मधोमध कुठे श्रुंगारलेला हत्ती, तर कुठे उमद्या घोड्यावर आरूढ झालेला स्वार अशा भव्य प्रतिकृती उभ्या करून त्या जागी त्यावरील उपमजल्यावर भरपूर मोकळी जागा ठेवली आहे. त्यामुळे तो देखावा अधिक भव्य दिसतोच, शिवाय वरील गॅलरीतूनसुद्धा तो वेगवेगळ्या कोनातून पाहता येतो. कांही ठिकाणी मुख्य मजल्यावरील हॉलच्या मध्यभागी छोटेसे रंगमंच उभारून समोर बसून पहायला खुर्च्या मांडून ठेवल्या आहेत. त्याच ठिकाणी वरील उपमजल्यांवर मध्यभागी ठेवलेल्या मोकळ्या जागेतूनही खालच्या रंगमंचावर चालणारे नाट्य पाहता येते. अशा प्रकारे सर्व जागेचा अत्यंत कल्पकतेने उपयोग करून घेतला आहे.
इथे फक्त शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन नाही. त्यांचा उपयोग होत असताना घडलेल्या घटना इथे तितक्याच प्रकर्षाने दाखवल्या आहेत. त्यामुळे त्याला जीवंतपणा आला आहे. त्याशिवाय ठिकठिकाणी छोटीशी, फक्त दहा पंधरा माणसे बसू शकतील एवढी लहान बंदिस्त सभागृहे आहेत. विशेष घटना दाखवणारी चलचित्रे त्यांमध्ये पडद्यावर एकापाठोपाठ एक दाखवीत असतात. आपण वाटेल तितका वेळ बसून ती पहात राहू शकतो. जागोजागी कॉम्प्यूटर मॉनिटर्स ठेवलेले आहेत. त्यांच्यासमोर बसून आपल्याला पाहिजे ती दृष्यशृंखला निवडून पहात बसता येते, तसेच महत्वाच्या गोष्टींबद्दल सविस्तर माहिती वाचता व पाहता येते. एका बाजूला 'शिकार' आणि दुस-या बाजूला 'युद्ध' अशा दोन मुख्य विभागात हे म्यूझियम विभागलेले आहे.
इंग्लंडमधील कांटेरी झुडुपातून कुत्र्यांच्या सहाय्याने केलेली रानडुकराची शिकार असो, दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीतील विशालकाय मगरींची किंवा भारतीय उपखंडातील घनदाट अरण्यातील हिंस्र पशूंची असो, त्यांची दृष्ये दाखवणारे त्रिमिति देखावे किंवा प्रचंड तैलचित्रे 'शिकार' या भागात पहायला मिळतात. त्यात पुन्हा वेगवेगळ्या कालखंडात वापरात आलेली तंत्रे, तत्कालिन शस्त्रे यांची माहिती दिलेली आहे. मानवी संस्कृतीच्या विकासाबरोबरच त्याच्या हातातील आयुधांचा कसकसा विकास होत गेला याचा मागोवाही घेता येईल. अनादि काळापासून माणसाची निसर्गाबरोबर झटापट चाललेलीच आहे, तिचे सम्यक दर्शन या भागात घडते.
जगभर वेगवेगळ्या खंडात झालेल्या सर्व मुख्य लढाया 'युद्ध' विभागात दाखवल्या आहेत. त्यात कांही देखाव्यांच्या स्वरूपात आहेत तर अन्य सर्व चित्रांच्या माध्यमातून प्रदर्शित केल्या आहेत. इतिहासाचा अभ्यास करणा-या लोकांसाठी तर ही पर्वणीच आहे. इंग्लंडच्या दृष्टीने महत्वाच्या सर्व युद्धघटनांची तारखेनिशी तपशीलवार माहिती विस्ताराने दिली आहे. भारत, चीन, जपान आदि पौर्वात्य राष्ट्रांमध्ये घडून गेलेल्या ऐतिहासिक घटना, तेथील युद्धशास्त्र, प्राचीन काळातील शस्त्रे, युद्धात घालण्याचे पोषाख यांचे दर्शन घडवणारे स्वतंत्र दालन आहे. याशिवाय आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व अमेरिका खंडातील आदिम रहिवाशांची बूमरँगसारखी वैशिष्ट्यपूर्ण हत्यारेसुद्धा संग्रहात ठेवून त्यांचा उपयोग कशा प्रकारे केला जात असे याची सुंदर सचित्र माहिती दिली आहे.
दर तासातासाला होणारे लाईव्ह शोज हे या जागेचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. म्यूझियममध्ये प्रवेश करतांनाच आपल्या हातात एक कागद दिला जातो, त्यात त्या दिवशी होणारे कार्यक्रम दिलेले असतात. त्याप्रमाणे ठरलेल्या वेळी नट नट्या त्या प्रसंगाला साजेसे असे कपडे घालून रंगमंचावर येतात व वीस पंचवीस मिनिटे त-हेत-हेचे नाट्य सादर करतात. यात प्रचंड विविधता असते. मी पाहिलेल्या एका प्रसंगात अंगात चिलखत घालून व डोक्यावर चिरेटोप चढवून ढाल व तलवारीचा वापर करून दोन योध्यांनी केलेले लुटुपुटीचे द्वंद्वयुद्ध दाखवले तर सैनिकांच्या सेवेसाठी युद्धावर गेलेल्या एका परिचारिकेने पाहिलेल्या जखमी वीरांची करुण कहाणी तिच्याच शब्दात एका स्वगताद्वारे दुस-या प्रसंगात ऐकवली. यातील एका सैनिकावर तेचे मन जडलेले असल्याने ते नाट्य अधिकच भावनाप्रधान झाले होते. तिस-या खेळात इतिहासकाळातील एका सुप्रसिद्ध सेनापतीने आपल्या जवानांना उद्देशून केलेले वीररस व देशभक्तीपूर्ण भाषण सादर केले होते. कधीकधी तर इमारतीसमोरील मोकळ्या जागी घोडेस्वारांची लढाईसुद्धा दाखवतात.
युरोप अमेरिकेत कुठल्याही प्रेक्षणीय स्थळी गेलात तर तेथून बाहेर पडण्याच्या वाटेवर दोन दालने नेहमी दिसतील. त्यापैकी एकात अल्पोपाहारगृह असते आणि दुसरे म्हणजे त्या जागेच्या ठळक खुणा दाखवणा-या सॉव्हेनीयर्सचे दुकान असते. तशी ती इथेही आहेतच. रॉयल आर्मरीजमध्ये आलेला प्रेक्षक दिवसभर इथेच गुंतून राहील याची त्याच्या व्यवस्थापकांना बहुधा खात्री असावी. कारण इथे दुस-या मजल्यावरसुद्धा एक प्रशस्त फास्टफूड सेंटर आहे. म्हणजे अर्धे प्रदर्शन पाहून झाल्यावर बाहेर न जाता खाण्य़ापिण्यासाठी मध्यंतर घेऊन, ताजे तवाने होऊन उरलेला अर्धा भाग निवांतपणे पहाण्याची सोय करून ठेवली आहे. नाना प्रकारची खेळण्यातली हत्यारे, मुखवटे आणि प्रदर्शनातील वस्तू व देखाव्यांची चित्रे काढलेल्या विविध वस्तु येथील स्मरणचिन्हांच्या दुकानात मिळतात. त्यात गालिचे, वॉल हँगिंग्ज, पिशव्या, रुमाल यासारखी कापडे तर असतातच, पण लहान मुलांसाठी पेन्सिल, रबर आणि फूटपट्ट्या, गळ्यात घालायच्या माळा वा कानात लटकवायची ईयररिंग्ज, कॉफी मग, फुलदाण्या वगैरे अगदी वाटेल त्या वस्तू असतात.
त्याशिवाय येथे आणखी एक नाविण्यपूर्ण अनुभव या ठिकाणी घेता येतो. बाहेर पडायच्या वाटेवरील दालनात दोन मोठमोठ्या बंदुका माउंट करून ठेवलेल्या आहेत व त्याला दुर्बिणी वगैरे व्यवस्थितपणे लावलेल्या आहेत. त्यांच्यासमोरील बंद केबिनमध्ये टार्गेट्स ठेवलेली असतात. त्यासाठी लागणारे शुल्क भरून कोणीही त्या लक्ष्यांवर नेम धरून या बंदुका चालवण्याची नेमबाजी करू शकतो व घरी जाता जाता कधी नव्हे तो बंदूक चालवण्याचा एक वेगळा अनुभव घेऊ शकतो. त्यासाठी परवाना वगैरे काढण्याची गरज नसते.
अशी ही एक वैशिष्ट्यपूर्ण जागा आहे. इथे शस्त्रास्त्रे नुसती दाखवायसाठी मांडून ठेवलेली नाहीत तर ती कुठे, कधी व कशी बनली, त्यांची वैशिष्ट्ये कोणती, ती कुणी कुणी कोठल्या प्रसंगी वापरली, त्याचा जगाच्या इतिहासावर कोणता ठसा उमटला अशा अनेक पैलूंचे एक समग्र दर्शन घडते, एवढेच नव्हे तर इथली शिल्पे, चित्रे, सिनेमे, नाट्यछटा, कॉंप्यूटर सिम्युलेशन्स वगैरे सारे पाहिल्यावर एक आगळाच सर्वंकश अनुभव घेऊन आपण बाहेर येतो.

श्रीराम जयराम

मला समजायला लागल्यापासून अगदी रोजच रामाचे नांव या ना त्या कारणाने कानावर पडतच आले आहे. पाहुण्यांचे स्वागत किंवा बोलण्याची सुरुवात "रामराम"ने होते. कधी कधी हा मनाविरुध्द केलेला 'जुलुमाचा रामराम' असतो. निरोप घेतांना पुन्हा "अमुचा रामराम घ्यावा " असे म्हणतात. कामाचा पसारा फार झाला तर त्याचा 'रामरगाडा' होतो आणि बरेच वेळा 'रामभरोसे' रहावे लागते. एकादी अनपेक्षित किंवा कल्पनातीत घटना पाहिली की इंग्रजाळलेले लोक 'ओ गॉड!' म्हणतात, तसे आमच्याकडे वेगळ्या पट्टीमध्ये 'राम राम' किंवा 'रामा रामा' म्हणतात. असंभव या मालिकेतले दीनानाथ शास्त्री सारखे "श्रीराम श्रीराम" म्हणत किती छान उसासे सोडत असतात! रोज सकाळी 'राम राम पाटील' नवनवे विषय घेऊन आपल्या भेटीला येतात. रामराव, रघू, रामप्रसाद, रामअवतार, रामनाथन, रामदुराई यासारखे रामाचे नांव धारण केलेले आपल्या ओळखीतले कोणी ना कोणी हटकून भेटतच असे. निवृत्तीनंतर माझा जनसंपर्क कमी झाला असला तरी टी.व्ही. पहाणे वाढले आहे. त्यामुळे प्रत्यक्षातली माणसे भेटली नाहीत तर पडद्यावरली पात्रे दिसतात.

रामाचा उल्लेख असलेली शेकडो लोकप्रिय मराठी आणि हिंदी गाणी आहेत. 'रामा रघूनंदना', 'रघुनंदन आले आले', 'उठी श्रीरामा पहाट झाली', 'विजयपताका श्रीरामाची', 'कौसल्येचा राम बाई', यासारखी मराठी आणि 'रामचंद्र कह गये सियासे', 'रामा रामा गजब हुई गवा री', 'रामजीकी निकली सवारी', 'राम करे ऐसा हो जाये', 'हरे कृष्ण हरे राम' यासारखी हिंदी गाणी यातले एकादे तरी गाणे अधून मधून कानावर पडते. त्याशिवाय 'रामका गुणगान करिये' आणि 'रामरंगी रंगले' वगैरे शास्त्रीय संगीतातली भजने आहेतच. लहानपणी भेंड्या खेळतांना 'र' हे अक्षर आले की फार चांगले वाटायचे, कारण रामाची अनेक गाणी तर आहेतच शिवाय रामाच्या श्लोकांनी भरलेला रामरक्षेचा मोठा रिझर्व्ह स्टॉक असल्यामुळे हरण्याची चिंता नसायची.

माझ्या लहानपणच्या बहुतेक मित्रांना रामरक्षा तोंडपाठ असायची. सगळ्या मुलांनी रोज संध्याकाळी शुभंकरोती झाल्यावर परवचे आणि रामरक्षा म्हणायची त्या काळी पध्दतच होती. त्यामुळे मला रामरक्षा वाचायला येण्यापूर्वीच ऐकून ऐकून पाठ झाली होती. त्यातल्या संस्कृत शब्दांचा अर्थ समजण्याचा प्रश्नच नव्हता. किंबहुना त्यांना कांही अर्थ असतो किंवा असायला हवा असा विचारही तेंव्हा मनाला शिवत नव्हता. पुष्कळ पुढल्या काळात संस्कृत आणि इतर भाषाविषयांचे शिक्षण घेतल्यानंतर त्यातला थोडा थोडा अर्थ समजू लागला आणि विविध अलंकार लक्षात येऊ लागले.

सुरुवातीचाच "ध्यायेदाजानुभावं धृतशरधनुष्यं बध्दपद्मासनस्थं।" हा श्लोक (समजला तर) साक्षात रामचंद्राची मूर्ती डोळ्यासमोर उभी करतो. आम्हाला मात्र त्यातली कमी अधिक होणारी लय तेवढी मजेदार वाटायची. या श्लोकातली जोडाक्षरे आणि विषेषतः धृतशरधनुष्यं, नवकमलमिलल्लोचनं असे शब्दप्रयोग न अडखळता म्हणता आले की बोलण्यातला बोबडेपणा संपला अशी स्पष्ट उच्चाराची एक तऱ्हेची परीक्षा होती. "शिरोमे राघवः पातु भालं दशऱथात्मजः। कौसल्येयो दृषौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती।" या श्लोकात डोके, कपाळ, कान, नाक, डोळे वगैरेंचे रक्षण करण्यासाठी रामाची जी वेगवेगळी नांवे घेतली आहेत त्यातून त्याचे कुल, आई वडील, बंधु, गुरू वगैरेंची माहिती होते. "स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः।" म्हणजे दिव्य अस्त्रांनी भरलेला भाता खांद्यावर बाळगणारा राम माझ्या खांद्याचे रक्षण करो आणि शिवधनुष्य भंग करणारा राम माझ्या बाहूंचे रक्षण करो या ओळी किती समर्पक आहेत? "सुग्रीवेश कटिः पातु सक्तिनी हनुमत्प्रभू" वगैरेमधून रामाच्या भक्तांचे उल्लेख येतात. रामरक्षेतील या श्लोकांमधून रामाच्या चरित्रातील वेगवेगळ्या गोष्टी तर समजतातच, शरीरशास्त्राचीसुध्दा थोडी तोंडओळख होते. शास्त्रविषय शिकवण्याची किती मजेदार रीत होती ना?

"रामो राजमणिःसदा विजयते रामम् रमेशम् भजे।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः।
रामान्नास्ति परायणम् परतरम् रामस्य दासोस्म्यहम्।
रामे चित्तलयःसदा भवतु मे भो राम मामुध्दर।।"

या श्लोकात प्रथमा ते सप्तमी या सात विभक्ती आणि संबोधन बरोबर क्रमाने येतात. त्यामुळे "रामः रामौ रामाः .. प्रथमा " पाठ करतांना विभक्तींचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी हा श्लोक सोयीचा होता. शार्दूलविक्रीडित या वृत्तात असल्यामुळे हल्ली हा श्लोक मंगलाष्टकांच्या स्वरूपात काना वर येतो. खाली दिलेल्या एका श्लोकात रामायणाचे सार दिले आहे.
आदौ राम तपोवनादिगमनम् हत्वा मृगम् कांचनम् ।
वैदेहीहरणम् जटायुमरणम् सुग्रीवसंभाषणम् ।।
वालीनिर्दलनम् समुद्रतरणम् लंकापुरीदाहनम् ।
पश्चाद्रावणकुंभकर्णहननम् एतद् हि रामायणम् ।।

रामायणावर आधारलेल्या असंख्य उत्तमोत्तम कृती आहेत. गदिमांच्या गीतरामायणाचे वर्णन थोडक्यात करताच येणार नाही. त्यावर तर एक स्वतंत्र लेखमालाच लिहावी लागेल. तुलसीदासाच्या रामचरितमानसाचे पारायण नवरात्राचे नऊ दिवस चालते. त्याबरोबरच अभिनय करून रामलीलेमधून रामायणातले प्रसंग रंगमंचावर उभे करतात. खरे तर आपले जीवन रामाने इतके व्यापलेले आहे की जेंव्हा एकाद्या गोष्टीत अर्थ किंवा स्वारस्य नसेल तर "त्यात राम नाही" असे म्हणतात. एरवी सगळीकडे राम भरलेलाच असतो!