Tuesday, February 24, 2009

खुशखबर - सत्ययुग येत आहे


गेल्या वर्षी शिवरात्रीला एका शिवमंदिरात दर्शनाला गेलो असतांना तिथे एक पत्रक वाटले जात होते. ते घरी आणून सहज वाचून पाहिले आणि इंटरेस्टिंग वाटले म्हणून ठेऊन दिले होते. जुने कागद पहातांना ते नेमके या शिवरात्रीला हातात आले. त्यात चार मुख्य परिच्छेद आहेत. त्यांचा सारांश असा आहे.

ईश्वराचे नांव, गुण आणि स्वरूप
ईश्वराचे वास्तविक नांव शिव असे आहे. अर्थात तो मंगलकारी, कल्याणकारी असा आहे. ज्योतिर्बिंदू हे त्याचे रूप आहे म्हणून सर्व धर्मात त्याच्या प्रकाशमय रूपाची पूजा केली जाते.
शिवाची दिव्य कर्तव्ये
ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन सूक्ष्म देवतांद्वारे विश्वाची उत्पत्ती, पालन आणि विनाश ही तीन कर्तव्ये त्रिमूर्ती शिव करत असतो. यांचे प्रतीक म्हणून शिवलिंगावर त्रिपुंड काढतात आणि बेलाच्या पानाचे त्रिदळ त्याला अर्पण करतात.
महाशिवरात्रीचे रहस्य
इथे रात्र या शब्दाचा अर्थ सूर्य मावळल्यानंतर झालेला काळोख एवढा सीमित नसून अज्ञान व अत्याचार यांचा अंधःकार असा आहे. या अंधःकाराचा नाश करून शिवाचे दिव्य अवतरण म्हणजे शिवरात्र.
आजच्या काळाचे महत्व
कलियुगाचा अंधःकारमय काळ आता संपत आला आहे. अधर्माचा विनाश करून धर्माची स्थापना करण्याचे दिव्य कर्तव्य पार पाडण्यासाठी शिवभगवान अवतीर्ण झाले आहेत.कलियुग संपून सत्ययुग सुरू होत आहे.

याबद्दल अधिक माहितीसाठी "खालील ठिकाणी संपर्क करावा" असे लिहून कांही पत्ते दिले होते. पण माझ्या मनातला अज्ञानाचा अंधार दूर करण्याचे इतर कांही खात्रीलायक आणि सोयिस्कर मार्ग जास्त आकर्षक वाटल्यामुळे मी त्या पत्त्यावर दिलेल्या जागी कांही गेलो नाही. शिवाय एवीतेवी सत्ययुग येणारच आहे तर त्याचा फायदा आपल्याला मिळेलच अशी आशा आहे.

No comments: