Thursday, February 19, 2009

समर्थ रामदास स्वामींचे पत्र (संपादित आवृत्ती ४ मार्च २०१३)


समर्थ रामदास स्वामींचे पत्र (Wikipedia मधून उद्धृत)
अखंड सावधान असावें । दुश्चित्त कदापि नसावें।
तजविजा करीत बसावें । एकांत स्थळी ॥ १॥
कांहीं उग्र स्थिति सांडावी । कांहीं सौम्यता धरावी।
चिंता लागावी परावी । अंतर्यामीं ॥ २॥
मागील अपराध क्षमावे । कारभारी हातीं धरावे।
सुखी करूनि सोडावे । कामाकडे ॥ ३॥
पाटवणी तुंब निघेना । तरी मग पाणी चालेना।
तैसें सज्जनांच्या मना । कळलें पाहिजे ॥ ४॥
जनाचा प्रवाह चालिला । म्हणजे कार्यभाग आटोपला।
जन ठायीं ठायीं तुंबला । म्हणजे खोटां ॥ ५॥
श्रेष्ठीं जें जें मिळविलें । त्यासाठीं भांडत बसलें।
मग जाणावें फावलें । गलिमांसी ॥ ६ ॥
ऐसें सहसा करूं नये । दोघे भांडतां तिस-यासी जय।
धीर धरोण महत्कार्य । समजून करावें ॥ ७ ॥
आधींच पडला धास्ती । म्हणजे कार्यभाग होय नास्ती।
याकारणें समस्तीं । बुद्धि शोधावी ॥ ८ ॥
राजी राखितां जग । मग कार्यभागाची लगबग।
ऐसें जाणोनियां सांग । समाधान राखावें ॥ ९ ॥
आधीं गाजवावे तडाके । मग भूमंडळ धाके।
ऐसें न होतां धक्के । राज्यास होती ॥ १० ॥
समय प्रसंग ओळखावा । राग निपटून काढावा।
आला तरी कळों न द्यावा । जनांमध्यें ॥ ११ ॥
राज्यामध्ये सकळ लोक । सलगी देऊन करावे सेवक।
लोकांचे मनामध्यें धाक । उपजोंचि नये ॥ १२ ॥
आहे तितुकें जतन करावें । पुढें आणिक मिळवावें।
माहाराष्ट्रराज्य करावें । जिकडे तिकडे ॥ १३ ॥
लोकीं हिंमत धरावी । शर्तीची तरवार करावी।
चढती वाढती पदवी । पावाल येणें ॥ १४ ॥
शिवराजास आठवावें । जीवित्व तृणवत् मानावें।
इहपरलोकी रहावें। कीतीर्रूपे ॥१५॥
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥
शिवरायाचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥१६॥
शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायाचें कैसें बोलणे॥
शिवरायचे सलगी देणें । कैसे असें ॥१७॥
सकळ सुखांचा त्याग । करून साधिजे तो योग ॥
राज्यसाधनाची लगबग । कैसी असे ॥१८॥
त्याहूनि करावे विशेष । तरीच म्हणावे पुरुष ॥
या उपरी विशेष । काय लिहावें ॥१९॥


छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी हे समकालीन होते. छत्रपती स्वामीजींना गुरुस्थानी मानत होते असे कांही लोक म्हणतात. पण कांही लोकांना ते तितकेसे मान्य नाही. शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगी रामदास स्वामी त्या स्थळी उपस्थित होते असे उल्लेख निदान मी वाचलेल्या लोकप्रिय साहित्यात तरी वाचल्याचे मला आठवत नाही. कौरव व पांडवांना लहानपणी विशिष्ट शिक्षण देणारे गुरु द्रोणाचार्य किंवा दशरथ राजाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे वसिष्ठ ऋषी अशा प्रकारचे घनिष्ठ असे गुरु शिष्य नाते त्या दोघांमध्ये नसावे. त्या दोघांची कार्यक्षेत्रे वेगळी होती. राज्य स्थापन करण्याच्या, त्यात वाढ करण्याच्या आणि आपल्या अंमलाखालील मुलुखाचा कारभार सुव्यवस्थितपणे चालवण्याच्या धामधुमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज गुंतलेले असल्यामुळे त्यांची व रामदास स्वामींची प्रत्यक्ष गांठभेट नेहमी होत नसेल. पण समर्थ रामदास सगळ्या जगालाच उद्देशून चार उपदेशाच्या गोष्टी सांगत हिंडत असतांना शिवाजी महाराजांच्या कार्याकडे लक्ष ठेऊन होते व व समाजाचे प्रबोधन करून त्याद्वारे अप्रत्यक्षपणे त्यांना हातभार लावत होते असे दिसते.
त्यांनी लिहिलेली कांही पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. विकीपीडियावरून घेतलेले एक पत्र वर दिले आहे. या पत्रात त्यांनी राज्यकारभाराच्या दृष्टीने कांही सूचना किंवा उपदेश दिला आहे.'समर्थ रामदास स्वामींचे छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र' अशा मथळ्याखाली हे पत्र दिले आहे. मात्र "हे पत्र शिवाजी राजस लिहीले नसून ते संभाजी राजस लिहिले आहे." अशी दुरुस्ती खाली केलेली आहे. (असे २००९ साली वाचले होते) "शिवरायाचा आठवावा प्रताप। शिवरायाचा आठवावा साक्षेप।" वगैरे सुप्रसिध्द ओळी त्या वेळी त्यात दिसल्या नाहीत. (या ओळींसह पुढीलपाच ओव्या आता मला मिळाल्या आहेत आमि मूळ पत्रात आता त्या जोडल्या आहेत)
या पत्रामधील उपदेश महत्वाचा आहे आणि सर्वच राज्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल असा आहे.
वर दिलेले चित्र स्वामी समर्थांच्या वेबसाईटवर दिले आहे. रत्नागिरीजवळील शिवसमर्थगडावर हे भित्तीचित्र चितारलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज एकदा समर्थ रामदासस्वामींना भेटायला आलेले असतांना स्वामींनी त्यांना सहजच एक खडक फोडायला सांगितले. वरून सर्व बाजूंनी बंद दिसणारा तो खडक फोडल्यावर त्याच्या आंत थोडे पाणी निघाले, इतकेच नव्हे तर त्या पाण्यात एक जीवंत बेडूक सुद्धा होता. जगातील यच्चयावत् जीवांची काळजी परमेश्वर वाहतो आहे आणि प्रजेचे पालन करणा-या राजापेक्षा तो किती तरी श्रेष्ठ आहेहे यावरून महाराजांच्या निदर्शनास आले आणि त्यांच्या मनात कणभरही अहंकार उरला नाही. अशी कथा या चित्रामधील घटनेबद्दल सांगतात.

No comments: