Wednesday, October 30, 2013

अणू, रेणू आणि देवाचा कण - भाग २



गेल्या तीन चार शतकांमध्ये युरोपात विज्ञानयुग अवतरले आणि अनेक शास्त्रज्ञांनी निरनिराळ्या दिशांनी वैज्ञानिक पद्धतीने संशोधन सुरू केले. निरनिराळी मूलद्रव्ये (Elements) आणि त्यांची संयुगे (Compounds) यांची रासायनिक सूत्रे (Chemical Formulae) मांडली गेली. दोन मूलद्रव्यांच्या (Elements) संयोगातून (Reaction)  प्रयोगशाळांमध्ये त्यांची संयुगे (Compounds) तयार केली आणि त्या संयुगांचे विद्युतशक्तीने पृथःकरण (Electrolysis) करून त्यातली मूलद्रव्ये वेगळी काढून दाखवली आणि त्यांची समीकरणे सप्रयोग सिद्ध केली गेली. हे करतांना मूलद्रव्याचा (Elements) सर्वात लहान कण हा Atom, आणि संयुगाचा (Compounds) सर्वात लहान कण हा molecule या त्या शब्दांच्या शास्त्रीय व्याख्या रूढ झाल्या. कुठल्याही पदार्थाचा या दोघांपेक्षा लहान कण अस्तित्वात नसतो असेच पुढील दोन तीन शतकेपर्यंत समजले जात होते.

या जगात असंख्य प्रकारचे नैसर्गिक रासायनिक पदार्थ आहेत. त्यांचेसंबंधी संशोधन करत असतांना त्यांचे पृथःकरण करून त्यांच्यामध्ये असलेले घटक वेगवेगळे केले गेले किंवा त्यांची ओळख पटवून घेतली गेली. ते पहात असतांना एक आश्चर्यजनक गोष्ट आढळून आली. नैट्रोजन, ऑक्सीजन, हैड्रोजन, क्लोरिन यासारखे प्रमुख वायू, लोह, तांबे, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, पोटॅशियम, पारा (मर्क्यूरी) यासारखे मुख्य धातू आणि कार्बन, सिलिकॉन, सल्फर, फॉस्फोरस यांसारखे काही अधातू अशा निवडक मूलद्रव्यांपैकीच काही एलेमेंट्स जगातल्या बहुतेक सगळ्या पदार्थांमध्ये मुख्यतः असतात असे दिसले. अधिक संशोधनानंतर हीलियम, आर्गॉन, रेडियम, युरेनियम वगैरे आणखी काही मूलद्रव्ये मिळाली, पण एवढी प्रचंड विविधता असलेल्या पृथ्वीवरील निसर्गात सर्व मिळून फक्त ९२ च मूलद्रव्ये आहेत हे प्रयोग आणि चिंतन यामधून नक्की ठरले. गेल्या शंभर वर्षांमध्ये त्यात आणखी सुमारे वीस मानवनिर्मित मूलद्रव्यांची भर आता पडली आहे. पण त्यांचे प्रमाण इतके कमी आहे की त्यांचे अस्तित्व फक्त नावापुरतेच आहे. याचा अर्थ हे संपूर्ण जग फक्त सुमारे शंभर प्रकारच्या मूलद्रव्यांच्या अणूंपासून बनलेले आहे. त्यातलीही निम्म्याहून जास्त मूलद्रव्ये अत्यंत दुर्मिळ (रेअर अर्थ्स) अशी आहेत. त्यांचा प्रत्यक्षात फारसा उपयोग केला जात नाही. फक्त चाळीस पन्नास प्रकारच्या अणूंपासून जवळ जवळ सगळे जग निर्माण झाले आहे असे म्हणता येईल.

या उपयोगी मूलद्रव्यांचे गुणधर्म प्रयोगशाळांमध्ये बारकाईने तपासून पाहतांना त्यातून निसर्गाचे विशिष्ट नियम समजत गेले. या चाळीस पन्नासामधलीसुध्दा सगळीच मूलद्रव्ये इतर सगळ्याच मूलद्रव्यांशी संयोग पावत नाहीत. उदाहरणार्थ लोह आणि सोने यांचे संयुग बनत नाही. दागीने बनवण्यासाठी सोन्यामध्ये तांबे मिसळले जाते पण ते फक्त मिश्रण असते. या दोन धातूंमध्ये रासायनिक प्रक्रिया (Chemical Reaction) होत नाही. जी मूलद्रव्ये संयोग पावतात ती विशिष्ट प्रमाणातच एकमेकांशी जुळतात. दोन भाग हायड्रोजन आणि एक भाग ऑक्सीजन मिळून पाणी तयार होते. जगातल्या कुठल्याही समुद्रातले, नदीतले किंवा डबक्यातले पाणी घेऊन तपासून पाहिले तर त्यात हेच प्रमाण दिसते. दोन भाग हायड्रोजन आणि दहा भाग ऑक्सीजन यांना जरी एकत्र ठेऊन त्यात ठिणगी पाडली तरी त्यातल्या फक्त एक भाग ऑक्सीजनचा उपयोग होईल आणि ९ भाग ऑक्सीजन शिल्लक राहील. त्याच प्रमाणे दहा भाग हायड्रोजन आणि एक भाग ऑक्सीजन एकत्र ठेऊन त्यात ठिणगी पाडली तरी फक्त दोन भाग हायड्रोजनचा उपयोग पाणी निर्माण करण्यात होईल आणि ८ भाग हायड्रोजन तसाच शिल्लक राहील. ठिणगी पडली नाही तर हायड्रोजन आणि ऑक्सीजन वायूंचे ज्वालाग्राही मिश्रण तयार होईल. नैट्रोजन, ऑक्सीजन, हैड्रोजन, क्लोरिन वगैरे वायूंचे अणू एकटे रहातच नाहीत. जेंव्हा त्यांचा दुस-या एकाद्या मूलद्रव्याच्या अणूंशी संयोग होत नाही तेंव्हा ते आपल्याच भावाशी जोडून घेऊन जोडप्याने एकत्र राहतात. या वायूंच्या प्रत्येक molecule मध्ये दोन दोन Atom असतात. यासारख्या अनेक गोष्टी या संशोधनांमधून समोर आल्या. हे असे का होत असावे याचा विचार केला गेला.

दोन, तीन किंवा अधिक मूलद्रव्यांपासून संयुग तयार होते तेंव्हा त्या मूलद्रव्यांचे अणू (Atom) एकमेकांना बांधून घेतात किंवा एकमेकांमध्ये अडकतात आणि त्यातून त्या संयुगाचा रेणू (molecule ) तयार होतो. त्या पदार्थाचे सगळे गुणधर्म या रेणूमध्ये असतात, रेणू हा त्याचा सर्वात सूक्ष्म असा कण असतो. त्याच्या अंतरंगात निरनिराळे अणू (Atom) असतात, पण ते सुटे नसतात रासायनिक (Chemical) बंधनात ते जखडले गेलेले असतात. संयुग बनल्यानंतर मूलद्रव्यांचे गुणधर्म शिल्लक रहात नाहीत. हायड्रोजन आणि ऑक्सीजन यांचे कुठलेच गुणधर्म पाण्यामध्ये नसतात, पाण्याचे गुण सर्वस्वी भिन्न असतात. भिन्न अणूंचे मिळून संयुग होत असतांना  त्यांच्यात हे बंध कां, कसे आणि केंव्हा तयार होऊ शकतील याची तात्विक चिकित्सा अणूंच्या मॉडेल्सवरून केली जाते. प्रत्येक मूलद्रव्यांचे अणू ठराविक प्रमाणातच दुस-या मूलद्रव्यांचे अणूंशी जुळतात याचे कारण त्या अणूंच्या अंतर्गत रचनेमध्ये असणार, हे विचार प्रबळ झाले. यावरून अणूच्या अंतर्गत रचनेची मॉडेल्स तयार केली गेली. अशी काही मॉडेल्स चित्रामध्ये दाखवली आहेत.

मुळात अणू हाच इतका सूक्ष्म कण असतो की कुठल्याही प्रकारच्या सूक्ष्मदर्शक यंत्रानेसुद्धा अख्ख्या अणूचे दर्शन घेणे देखील केवळ अशक्य आहे. त्याच्या अंतरंगात डोकावून पाहण्याचा प्रश्नच येत नाही. यामुळे अणू या मूल कणाची रचना कशी असावी यावर फक्त तात्विक विवेचन करणे शक्य आहे. पण ही रचना अशा अशा प्रकारची असल्यास त्यामुळे त्या अणूचे गुणधर्म असे असे होतील आणि तो पदार्थ अशा अशा प्रकारे वागेल असे तर्कानेच ठरवता येते.  या कामात निरनिराळ्या मॉडेल्सचा उपयोग केला जातो. प्रत्यक्षामध्ये अणूचे बाह्य किंवा अंतरंग असेच असेल किंवा वेगळेच असेल, हे कोणीच पुराव्यानिशी सांगू शकणार नाही. पण अभ्यास करण्यासाठी ते असे असे आहे असे गृहीत धरून त्याची समीकरणे मांडली जातात आणि प्रयोगावरून ती सिद्ध झाली तर तेवढ्यापुरते तरी ते मॉडेल बरोबर आहे असे मानले जाते.

 

या सगळ्या मॉडेल्समध्ये असे दाखवले आहे की अणूंच्या मध्यभागी एक अणूगर्भ (न्यूक्लियस) असतो. त्यात धनविद्युतभार असलेले प्रोटॉन्स नावाचे आणि कुठलाही विद्युतभार नसलेले न्यूट्रॉन्स नावाचे कण असतात. अणूचे बहुतेक सगळे वस्तुमान या दोन प्रकारच्या कणांमध्येच असते. इलेक्ट्रॉन्स नावाचे ऋण विद्युतभार असलेले अतीसूक्ष्म कण या न्यूक्लियसच्या सभोवती घिरट्या घालत असतात. प्रत्येक अणूमधील प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स यांची संख्या नेहमी समसमान असते. त्यामुळे या दोघांनी मिळून बनलेला अणू न्यूट्रल म्हणजे विद्युतभारहीन असतो. या प्रकारच्या रचनांमधून हे स्पष्ट होते की अणू हा सर्वात सूक्ष्म कण राहिला नाही. त्याचा भाग असलेले प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे कण अणूपेक्षा खूपच छोटे असतात, विशेषतः इलेक्ट्रॉन्स तर अगदीच सूक्ष्म असतात.

 . . . .  . . . . . . . . . . .  . . (क्रमशः)

Tuesday, October 29, 2013

अणू, रेणू आणि देवाचा कण - भाग १

मातीचे ढेकूळ नुसते हाताने चुरगाळले तरी त्याचा भुगा होतो, मातीच्या मानाने दगड बराच कठीण असतो, पण त्यालाही फोडून त्याचे तुकडे करता येतात, ते करतांना दगडाचा थोडा बारीक चुराही निघतो, करवतीने लाकूड कापतांना त्याचाही पिठासारखा भुसा पडतो, गहू, ज्वारी वगैरे धान्ये दळल्याने त्यांचे पीठ होते वगैरे नित्याचे अनुभव आहेत. कुठलाही घनरूप पदार्थ कुटून, ठेचून किंवा घासून त्याची पूड करता येते, ते करतांना त्या पदार्थाचे बारीक कण वेगवेगळे होतात. यातल्या प्रत्येक कणांमध्ये मूळ पदार्थाचे सगळे गुण असतात. पावसाचे पाणी लहान लहान थेंबांमधून पडते आणि आता थंडीच्या दिवसात सकाळी आपल्याला पानांवरले दंवबिंदू दिसतील. ते तर आकाराने खूपच लहान असतात. थोडक्यात सांगायचे तर जगातल्या सगळ्या वस्तूंचे रूपांतर त्यांच्याच सूक्ष्म कणांमध्ये होऊ शकते.

चिमूटभर साखरेतले निरनिराळे कण डोळ्यांना दिसतात आणि बोटाने त्यांना वेगळे करता येतात. त्याची पिठीसाखर केली तर तिचे कण मात्र डोळ्यांनाही वेगवेगळे दिसत नाहीत आणि त्यातल्या एका कणाचा वेगळा स्पर्शही बोटाला जाणवत नाही. डोळे आणि त्वचा या आपल्या ज्ञानेंद्रियांच्या जाणीवा सुमारे एक दशांश मिलिमीटरपेक्षा सूक्ष्म आकाराच्या पदार्थांना ओळखत नाहीत. नाक आणि जीभ मात्र अधिक संवेदनाशील इंद्रिये आहेत. डोळ्यांना न दिसणा-या कणांचा गंध किंवा रुची यावरून ती वस्तू ओळखता येते. पण एका मर्यादेच्या पलीकडे तेसुद्धा शक्य नसते. अनेक सूक्ष्म कणांनी मिळून तयार झालेली चिमूटभर पिठीसाखर एकत्रितपणे डोळ्यांना दिसते आणि बोटांना जाणवते. हीच साखर पेलाभर पाण्यात घालून ढवळली की ती पाण्यात विरघळून जाते आणि पूर्णपणे अदृष्य होते. साखरेमुळे त्या पाण्याला आलेला गोडवा जिभेला जाणवतो या अर्थी ती साखर नष्ट झालेली नसते, पण पाण्यात विरघळण्याच्या क्रियेत तिचे कण अत्यंत सूक्ष्म झालेले असल्यामुळे ते मात्र डोळ्यांना मात्र दिसत नाहीत.

पदार्थांच्या अशा प्रकारे होत असलेल्या विघटनाच्या गुणधर्मांबद्दल विचार करतांना काही तत्वज्ञान्यांना असे वाटले की जगातले सगळे पदार्थ मुळात सूक्ष्म अशा कणांच्या समुदायामधूनच बनत असावेत. असे असंख्य कण एकमेकांना चिकटून त्याचा आकार बनतो आणि त्यांच्यामधले बंधन तोडल्यास ते वेगळे किंवा सुटे होतात. कोणताही पदार्थ वायुरूप असतो तेंव्हा हे सूक्ष्म कण इतस्ततः सुटे फिरत असतात, पण तो द्रवरूप झाला की ते एकमेकांना सैलसर चिकटतात आणि घनरूपात ते एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात. उदाहरणार्थ पाण्याची वाफ हवेत सगळीकडे विरून जाते, द्रवरूप पाणी एकत्र राहते, पण त्याला स्वतःचा आकार नसतो आणि त्याला गोठवून बर्फ केल्यास त्याचा ठोकळा बनवता येतो. तो आपला आकार टिकवून ठेवतो. हे सगळे कशामुळे होते हा प्रश्न होता. एक अज्ञात शक्ती या कणांना एकमेकांशी बांधून ठेवत असते एवढेच माहीत होते.

"कुठल्याही पदार्थाचे लहान लहान तुकडे करत गेल्यास अशी एक वेळ येईल की त्याचे आणखी लहान तुकडे होऊ शकणार नाहीत" असा सिद्धांत कणाद या भारतीय तत्वज्ञान्याने (वाटल्यास शास्त्रज्ञाने म्हणावे) मांडला होता. पदार्थांच्या या सर्वात लहान कणाला त्याने 'अणू' असे नाव दिले होते. 'वैशेषिक' नावाची तत्वज्ञानाची एक शाखा कणादमुनींनी सुरू केली होती. 'नैनम् छिन्द्यन्ति शस्त्राणि" असा हा अविभाज्य अणू त्या तत्वज्ञानानुसार अमर असतो. दोन किंवा तीन अणूंचे गट असू शकतात, निरनिराळ्या पदार्थांचे अणू एकमेकांशी संयोग पावून त्यातून वेगवेगळे नवे पदार्थ उत्पन्न होतात असे प्रतिपादनसुध्दा कणादाच्या या तत्वज्ञानात होते असे म्हणतात. या सगळ्या गोष्टी रसायनशास्त्रातल्या प्राथमिक आणि मूलभूत तत्वांशी ब-याच प्रमाणात जुळतात. पारंपारिक भारतीय शास्त्रांनुसार माती, पाणी, उजेड, वारा म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू आणि त्याशिवाय आकाश ही पंचमहाभूते समजली जातात. विश्वामधील कोणताही पदार्थ यांच्यामधूनच तयार होतो असे मानले जाते. या पंचमहाभूतांच्या जोडीला दिक्, काल, मन आणि आत्मा यांचाही विचार करून अशा एकंदर नऊ तत्वांमधून सर्व सजीव तसेच निर्जीव सृष्टी निर्माण झाली आहे असे महर्षी कणादमुनींनी प्रतिपादन केले आहे. हे देखील ढोबळमानाने पाहता बरोबरच आहे, पण स्पष्ट अस्तित्व असलेली माती किंवा पाणी, विचार किंवा भावना यांनीच समजता येत असलेले मन आणि पूर्णपणे काल्पनिक संकल्पना असलेला आत्मा यांची अशा प्रकारे एकत्र मिसळ करणे सायन्समध्ये बसत नाही.

मूलद्रव्य (Elements), संयुग (Compounds) किंवा मिश्रण (mixtures) यापैकी एकात जगातील सर्व वस्तूंची गणना होते. हे सत्य कणादमुनींच्या काळात बहुधा प्रस्थापित झालेले नसावे. त्यामधील मूलद्रव्य आणि संयुग यांना विशिष्ट गुणधर्म असतात आणि त्यांचे मिश्रण केले तरी ते गुण टिकून राहतात. सर्व पदार्थांच्या या तीन वर्गात केलेल्या विभाजनामुळे त्यांचे सर्वात लहान कण या अर्थाने Atom आणि molecule  हे शब्द वापरात आले आणि या इंग्रजी शब्दांसाठी अणू, परमाणू, रेणू वगैरे मराठी प्रतिशब्द आता रूढ झाले आहेत. (त्यातसुध्दा अनुक्रमे परमाणू व अणू आणि अणू व रेणू असे दोन पाठभेद आहेत.) अणू या शब्दाचा कणादमुनींना अभिप्रेत असलेला अर्थ कशा प्रकारचा होता कोण जाणे, पण तो Atom किंवा molecule या शब्दांच्या सध्या प्रचलित असलेल्या अर्थांपेक्षा निश्चितपणे निराळा होता. अणू या कणादमुनींच्या संकल्पनेचा आकार, वजन, क्रमांक, विद्युत भार, त्याची अंतर्गत रचना अशा प्रकारची कसलीही शास्त्रीय माहिती कुणादमुनींच्या तत्वज्ञानात दिलेली आहे असे माझ्या अल्पशा वाचनात मला तरी कुठे आढळले नाही. अणू हे सर्व पदार्थांचे अतीसूक्ष्म असे कण आहेत असे मात्र बहुधा त्यांनीच पहिल्यांदा खूप पूर्वी सांगितले होते एवढे सर्वमान्य आहे. जगातले सगळेच ज्ञान ब्रह्मदेवाने वेदांमधून काही निवडक ऋषींना दिले होते असा ज्यांचा दृढ समज आहे अशा लोकांच्या दृष्टीने पाहता कणादमुनींनी देखील हे ज्ञान वेदाध्यनामधून प्राप्त केले असेल तर त्यांना अणूचे आद्य संशोधक म्हणता येणार नाही. शिवाय प्राचीन काळामधील काही जैन मुनी आणि डेमॉक्रिटस नावाचा ग्रीक फिलॉसॉफर यांनीसुध्दा परमाणू आणि अॅटम या सूक्ष्म कणांची कल्पना केलेली होती असेही सांगितले जाते. प्राचीन काळामधले हे सगळे प्रयत्न फक्त अचाट कल्पनाशक्ती आणि तर्कशुध्द विचार यांमधून केले गेले होते. प्रात्यक्षिके, प्रयोग, निरीक्षण, परीक्षण, गणित वगैरेंमधून त्यांना जोड देऊन ते विचार शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध केले गेले नव्हते, तसेच अणू, परमाणू, रेणू वगैरे शब्दांच्या व्यवस्थित शास्त्रीय व्याख्या केलेल्या नव्हत्या.

अणू हे सूक्ष्म सूक्ष्म म्हणजे नेमके किती सूक्ष्म असतात हे बहुतेक लोकांना माहीत नसते. अब्ज, खर्व, निखर्व, परार्ध वगैरे संख्यांचा नेमका अर्थही सहसा कोणाला समजत नाही. यापेक्षा तुलनेने असे सांगता येईल की भारताची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या कित्येक पट अणू धुळीच्या एका कणात असतात. अशा प्रकारच्या अवाढव्य संख्या १, २, ३, ४ असे करून मोजता येत नाहीत. त्यासंबंधी काही सिद्धांत मांडले जातात, त्यांच्यासोबत काही समीकरणे येतात, प्रयोगांमधून मिळालेल्या माहितीवरून किचकट आकडे मोड करून त्या ठरवतात. हे सिद्धांत आणि समीकरणे अनेक शास्त्रज्ञांनी तपासून पाहिल्यानंतर त्या आकड्यांना सर्वमान्यता मिळते. कणादमुनींच्या कालखंडात हे सगळे झाले असल्याचा निर्देश कुठे दिसत नाही. 



 . . . .  . . . . . . . . . . .  . . (क्रमशः)

Tuesday, October 22, 2013

स्मृती ठेवुनी जाती - १० मालिनी खासगीवाले

कै.श्रीराम परांजपे हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि ख्यातीप्राप्त इंजिनियर होते, त्यांच्या निधनाची बातमी वर्तमानपत्रांमध्ये छापून आली. कै.मालिनीताई खासगीवाले प्रसिध्दीपासून दूर राहिलेल्या समाजसेविका होत्या. त्या कधी निजधामाला गेल्या हे मलाही समजले नाही. परांजप्यांची ओळख माझ्या नोकरीमध्ये झाली, तर मालिनीताईंची ओळख नातेसंबंधांमधून झाली. परांजपे यांचा आणि माझा परिचय सत्तेचाळीस वर्षांपूर्वी झाला आणि थोडाच काळ राहिला तर गेली चाळीस वर्षे नेहमीच मालिनीताईंची अधूनमधून भेटगाठ होत राहिली होती. माझ्या दृष्टीने पाहता या दोन्ही व्यक्ती मला वडीलधा-या आणि आदरणीय होत्या, त्या कायम लक्षात राहण्यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण होत्या आणि त्यांचे निधन काही काळापूर्वी झाले एवढाच त्यांना जोडणारा मुख्य धागा म्हणता येईल. यामुळे मी या दोन लेखात या दोघांचा एकापाठोपाठ एक समावेश केला आहे. त्यांचा एकमेकांशी परिचय असण्याची बरीच शक्यता होती, त्या एकमेकांना भेटल्या असाव्यात किंवा वारंवार भेटत असतीलही, पण त्याच वेळी मीसुध्दा त्या जागी उपस्थित होतो असे मात्र कधी झाल्याचे मला आठवत नाही.

माझ्या काही मित्रांना एका प्रॉजेक्टसाठी वर्षभरासाठी फ्रान्सला पाठवायचे ठरले तेंव्हा त्यांच्याकडून एक बाँड घेतला गेला. त्या बाँडवर कोणा वरिष्ठ दर्जाच्या अधिका-याची गॅरंटीयर म्हणून सही पाहिजे होती. त्या मित्रांचे वरिष्ठ अधिकारी स्वतःच त्या टीममध्ये जात असल्यामुळे ते सही देऊ शकत नव्हते. यामुळे इतर मित्रांचे नातेवाईक, नातेवाईकांचे मित्र, शेजारी वगैरेंमधून माझे मित्र त्यांच्यासाठी गॅरंटीयर शोधत होते आणि त्यांना ते मिळाले. त्यातल्या एका मित्राने मला आनंदाने सांगितले, "चला, आज माझं काम एकदाचं झालं, केमिस्ट्री डिव्हिजनमधल्या डॉ.खासगीवाल्यांनी मला सही दिली."     
त्या वेळी डॉ. कारखानावाला नावाचे पारशी सद्गृहस्थ केमिस्ट्री डिव्हिजनचे डायरेक्टर होते. हा खासगीवाला त्यांचाच सगेवाला असावा असे वाटून मी म्हंटले, "हा पारशी कसा काय तयार झाला?" 
मित्राने सांगितले, "अरे ते कोणी खासगीवाला नाहीत, पुण्याचे घरंदाज खासगीवाले आहेत." खासगीवाले हे नाव मी पूर्वी कधी ऐकले नसल्याने मला मराठी वाटत नव्हते. त्यांच्या पूर्वजांमधल्या कोणाला पेशव्यांच्या काळात ही उपाधी मिळाली होती असे स्पष्टीकरण त्यावर मिळाले. माझ्या मित्राशी जुजबी ओळखपाळखसुद्धा नसतांना त्याच्यावर एवढा विश्वास टाकून आर्थिक धोका पत्करणा-या त्या उदार मनाच्या सद्गृहस्थांबद्दल माझ्या मनात आदरयुक्त कुतूहल निर्माण झाले. आपण एकदा त्यांना पहावे, भेटावे असे वाटले, पण माझा मित्र तर फ्रान्सला निघून गेला होता, आता मला त्यांच्याकडे कोण नेणार? यामुळे ते राहून गेले.

माझे लग्न झाल्यानंतर अलकाचे सगळे नातेवाईक माझे आप्त झाले. तिच्या लहान गावातल्या माहेरच्या पुरातन आणि अवाढव्य वाड्यात तीन पिढ्यांमधले बरेचसे लोक रहात असत, अजूनही राहतात. शिक्षण आणि नोकरीच्या निमित्याने बाहेरगावी राहणारी मुले आणि लग्न होऊन सासरी गेलेल्या माहेरवाशिणीसुध्दा वर्षामधून काही काळासाठी सवड काढून तिथे येऊन सर्वांच्या सहवासात रहात आले आहेत. त्यामुळे त्या सर्वांमध्ये खास जवळीक निर्माण झाली आहे. चुलत बहिणींचे दीर, जावा, नणंदा किंवा चुलत चुलत काकूंचे भाऊ, वहिनी यासारखे दूरचे नातेवाईकसुध्दा तिथल्या बहुतेकांना माहीत असतात. एकदा अलकाच्या एका चुलत चुलत बहिणीकडे आम्ही गेलो असतांना त्यांनी मला विचारले, "तुम्ही बीएआरसीमधल्या डॉ.खासगीवाल्यांना ओळखत असालच ना?"
"मी त्यांचं नाव ऐकलं आहे, पण आमची अजून प्रत्यक्ष भेट झाली नाही. आमचं डिपार्टमेंट एवढं मोठं आहे की काम पडल्याशिवाय सहसा कोणाची ओळख होत नाही."
"अहो, आमचे हे मामा आणि आमच्या या मामीसुद्धा फारच चांगली माणसं आहेत, तुम्ही त्यांना भेटाच."
त्यावर अलका म्हणाली, "हो, मला ते लोक माहीत आहेत. ते कुठे राहतात?"
"तेसुद्धा तुमच्या चेंबूरलाच राहतात."
"हो का? मग नक्की भेटू."
या मामामामी म्हणजे डॉक्टर आणि मालिनीताई खासगीवाले या व्यक्तींची माझी पहिली ओळख ही अशी सांगण्या ऐकण्यातून झाली. मला देखील त्या दोघांना भेटण्याचे कुतूहल आणि इच्छा होतीच, त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी मला एक धागाही मिळाला. पण संधी आणि वेळ मिळत नव्हता. त्यांचा पत्ता वगैरे लिहून घ्यायचेही राहून गेले होते. प्रयत्न करून मला तो मिळू शकला असता, पण तेवढे कष्ट घेतले गेले नाहीत. एकदा मी ऑफिसला गेलेलो असतांना आणि काही कामासाठी अलका कुठेतरी गेली असतांना तिला चेंबूरच्या बाजारात की बसमध्ये खासगीवाले मामी अचानक दिसल्या. समोरासमोर येताच, "मामी!", "तू अलका ना?" अशा संवादामधून त्यांनी आपल्या स्मरणातले जुने धागे पुन्हा जोडून घेतले. खरे तर मामींना त्या वेळी अलकाला त्यांच्या घरीच घेऊन जायचे होते, पण त्या काळात टेलीफोन, मोबाईल वगैरे काही सोय नसल्याने मला निरोप कसा द्यायचा हा प्रश्न होता आणि मी ऑफीसातून घरी येऊन दारावर लागलेले कुलूप पाहिले असते तर गोंधळ झाला असता. "पुढच्या वेळी आम्ही चेंबूरच्या मार्केटमध्ये येऊ तेंव्हा नक्की तुमच्या घरी येऊ." असे आश्वासन देऊन अलकाने त्यांच्या घराचा पत्ता आणि जवळपासच्या खुणा विचारून घेतल्या.

त्या काळात आम्ही चेंबूरच्या सिंधी कँपमध्ये रहात होतो. तिथले सगळे वड्डी साँई दुकानदार आमच्यासारख्या भोळ्या भाबड्या ग्राहकांना गंडवायला टपून बसले आहेत असा आमचा ग्रह झालेला असल्यामुळे आम्ही नेहमी खरेदीसाठी चेंबूर स्टेशनजवळच्या बाजारात जात होतो. आम्ही पुढल्या खेपेला तिकडे गेलो तेंव्हा खासगीवाल्यांचे घर शोधून काढले. ते हमरस्त्यावरच असल्यामुळे सहजच सापडले. आम्हाला पाहून त्या दोघांनाही खूप आनंद झाला. त्यांनी अत्यंत आपुलकीने आमचे स्वागत केले. आम्ही कुठे राहतो, तिथे आमचे बस्तान कसे बसले आहे, काही अडचणी आहेत का वगैरेची वडिलधा-या माणसांच्या मायेने चौकशी केली, आमच्या कुटुंबांमधल्या समाईक नातेवाईकांची विचारपूस केली. थोडे बसणे बोलणे झाल्यानंतर "आमच्या स्वैपाकाची तयारी सुरू झालेलीच आहे, आता रात्रीचे जेवण करूनच जा," असा आग्रहही मामींनी केला. पण असे आगांतुकपणे कुणाच्या घरी जायचे आणि थेट पाटावर जाऊन बसायचे हे माझ्यातल्या जावयाला शोभणारे नव्हते. माझे आढेवेढे पाहून मामांनी ते ओळखले आणि पुढे कित्येक वर्षे ते मला "या जावईबापू !" असेच गंमतीने म्हणत राहिले.

त्या दिवशी मामींनी आम्हाला निदान सूप तरी पिऊन जायला सांगितले आणि पोटात भूक लागलेली असल्याने आम्हीही ते आनंदाने मान्य केले. त्यापूर्वी म्हणजे लहानपणी आमच्या घरी टमाट्याचे सार बनवले जात असे ते रस्समसारखे पाणीदार असायचे. चिनी हॉटेलांमधले सूप चांगले दाट असायचे पण ते बेचव वाटायचे. मामींनी तयार केलेले सूप तसेच दाट होते, पण त्याला मराठी माणसाला आवडावी अशी रुची आणि खास फ्लेव्हर होता, शिवाय त्यात थोडे ताजे लोणी किंवा क्रीम घालून त्याची चंव आणखी वाढवली असावी. असे अप्रतिम सूप मी पहिल्यांदाच चाखून पाहिले होते हे मी मोकळेपणे सांगून टाकले. त्यांना त्याची खात्री असावीच. पहिला बाउल संपताच त्यांनी लगेच तो भरून दिला. त्याबरोबर दिलेल्या साइड डिशेस खाऊन आमचे तसेही जवळ जवळ पोटभर जेवण होऊन गेले. "चेंबूरला बाजार करायला केंव्हाही आलात तर थोडी विश्रांती घ्यायला आमच्याकडे याच, शिवाय तुम्हाला पुन्हा कधी सूप प्यावेसे वाटले तर निःसंकोचपणे मुद्दाम आमच्या घरी म्हणूनही या." असे मामींनी निरोप देतांना प्रेमाने सांगितले. आमची मुले लहान असतांना आम्हालाही त्यांचे कपडे बदलणे, त्यांना दूध पाजणे वगैरेंसाठी निवा-याची जागा लागत असायची आणि आम्ही खासगीवाल्यांकडे अधून मधून जात राहिलो. एकदा आम्ही बाजारहाट करतांना माँजिनीमधून घेतलेल्या सामानातले सूपस्टिक्सचे पॅकेट मामींनी पाहिले आणि आपणहून सूपसाठी टोमॅटो शिजवायला ठेवले. त्यांनी वेळोवेळी इतर अनेक चविष्ट पदार्थही कौतुकाने करून आम्हाला खाऊ घातले.  

मामा तर रसायनशास्त्रातले डॉक्टरेट होतेच, मामीसुध्दा नुसत्या सुग्रण हाउसवाइफ नव्हत्या. त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून काही पदव्या आणि पदविका घेतल्या होत्या आणि त्या महाराष्ट्र शासनाच्या समाजविकास किंवा अशाच एकाद्या खात्यात अधिकारीपदावर होत्या. अनाथ, निराधार बालके किंवा महिलांसाठी चेंबूर मानखुर्द भागातच तीन चार वसतीगृहे आहेत, मुंबईमध्ये आणखी किती तरी असतील. अशा प्रकारच्या संस्थांच्या कामाशी मालिनीताई निगडित होत्या. या कामात त्यांना अनेक बरेवाईट, जास्त करून वाईटच अनुभव अनेक वेळा येत, काही वेळा त्यांना त्या संस्थांमध्ये जाऊन मुक्कामाला तिकडेच रहावे लागत असे. अशा वेळी त्यांची ओढाताण होत असे. एरवी त्या आपला वेळ नोकरी आणि घरगृहस्थी यांमध्ये व्यवस्थितपणे वाटून देत असत, कधी कधी कामामध्ये आणीबाणीचे प्रसंग आले तर मात्र त्यांना ताबडतोब तिकडे धावावे लागत असे. पण हे सगळे काम त्या हंसतमुख राहून, शांत चित्ताने, तळमळीने आणि मन लावून करत असत. त्याबद्दल त्यांनी तक्रारीच्या सुरात बोललेले मी कधीच ऐकले नाही. त्या वसतीगृहांमधल्या दुर्दैवी स्त्रिया आपल्या किंवा सर्वसामान्य लोकांच्या मानाने किती हाल अपेष्टा आणि मानसिक त्रास भोगत आहेत, त्यांच्या जीवनात किती असुरक्षितता आहे याची त्यांना खूप कणव वाटत असे आणि त्यांना कशा प्रकारे मदत करता येईल, त्यांचे कष्ट कसे कमी करता येतील याचे विचार त्यांच्या मनात घोळत असत. उंबरठा हा चित्रपट पाहतांना माझ्या डोळ्यासमोर मालिनीमामी येत राहिल्या. त्या सिनेमातल्या स्मिता पाटीलला तिच्या घरातून तीव्र विरोध झाल्यामुळे तिला घराचा उंबरठा ओलांडून जावे लागले होते. मामींच्या सुदैवाने मामा त्यांच्या पाठीशी उभे असल्याने त्यांच्या जीवनात असले द्वंद्व आले नाही. त्यांना भरपूर कसरत किंवा धावपळ मात्र करावी लागत असे.

खासगीवाले मामा इतके सीनियर होते की त्यांना अणुशक्तीनगरमध्ये चांगले प्रशस्त क्वार्टर सहज मिळू शकले असते, पण मामींना गरज पडताच पटकन कुठेही जाण्यायेण्यासाठी चेंबूर स्टेशनजवळ असलेली लहानशी जागा जास्त सोयीची होती. त्यामुळे ते दोघेही तिथेच राहिले. मामांना रिटायर होऊन आता वीस वर्षे तरी होऊन गेली असतील. त्यांच्या काही काळानंतर मामीही सेवानिवृत्त झाल्या. त्यानंतर ते दोघे पनवेलला बांधलेल्या त्याच्या नव्या आणि मोठ्या घरात रहायला गेले आणि आमच्या भेटी दुर्मिळ झाल्या. मामा शास्त्रज्ञ आहेत त्याबरोबर उत्तम संगीतज्ञही आहेत, ते स्वतः तबला वाजवून अनेक गायक कलाकारांना साथ देत असत. वयोमानानुसार त्यांचे वादन कमी होत गेले तरी चेंबूर भागातल्या सगळ्या मुख्य संगीत सभांना एक जाणकार श्रोता म्हणून ते पनवेलहूनसुद्धा आवर्जून येत राहिले. मामींनाही गायनाची आवड असल्याने बहुतेक वेळी त्यासुद्धा त्यांच्यासोबत येतच असत. अशा ठिकाणी आमच्या भेटी आणि गप्पा होऊ लागल्या. 

पण वयोमानानुसार पुढे पुढे ते भेटणे हळूहळू कमी होत गेले आणि त्यांना तसेच आम्हालाही तपासण्या किंवा औषधोपचार यासाठी हॉस्पिटलला जाण्याची जास्त गरज पडू लागली. गेल्या चार पाच वर्षात आमच्या भेटी बहुधा हॉस्पिटलमध्येच झाल्या असाव्यात. मागच्या वर्षीच एकदा आम्ही दोघे हॉस्पिटलच्या मेडिकल ओपीडीमध्ये आमचा नंबर येण्याची वाट पहात बसलो होतो. अलकाची प्रकृती जरा जास्तच खराब झालेली असल्यामुळे ती डोळे मिटून स्वस्थ बसली होती. खासगीवाले मामामामीही त्यांच्या फॉलोअप व्हिजिटसाठी आले होते. आमची नजरानजर होताच मी त्यांना हात दाखवला. पण नेहमीप्रमाणे आम्ही दोघे लगेच त्यांच्याकडे गेलो नाही यावरून काही तरी घोळ आहे हे त्यांच्या लक्षात येताच ते दोघे उठून आमच्याकडे आले. पाठीवरून हात फिरवून धीर दिला, "सगळं ठीक होऊन जाईल, काळजी करू नको" वगैरे सांगितले आणि आमच्याजवळ बसून राहिले. हॉस्पिटलमध्ये आलेले असले तरी ते दोघे तसे ठीकच दिसत होते, मामांच्या शरीरावरल्या वृद्धापकाळाच्या खुणा गडद होत होत्या, त्यांना त्या त्रस्त करतांना दिसत होत्या, त्यांची श्रवणशक्ती मंदावली होती, त्यामुळे संवाद साधणे कठीण जात होते, पण मामी पूर्वीसारख्याच चुणचुणीत दिसत होत्या त्यांना कसलाही त्रास होत नसावा असे त्यांच्या देहबोलीमधून आणि चेहे-यावरून वाटत होते.

दीड दोन महिन्यापूर्वी डॉक्टरांना प्रकृती दाखवण्यासाठी अलका हॉस्पिटलमध्ये गेली होती. त्या दिवशी जरा जास्त गर्दी असल्यामुळे तिचे काम संपायला बराच उशीर झाला. तोंवर जेवायची वेळ होऊन गेली होती. त्यामुळे तिच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने तिला लवकर घरी परतणे आवश्यक होते. हॉस्पिटलमधून बाहेर निघण्याच्या वाटेवर तिला अचानक खासगीवाले मामा भेटले. मामींना वॉर्डमध्ये अॅडमिट केले असून त्यांच्यावर केमोथिरपी होत असल्याचे धक्कादायक वृत्त त्यांनी सांगितले. पण हॉस्पिटलच्या नियमानुसार ती पेशंटला भेटण्याची वेळ नव्हती आणि त्यासाठी तीन चार तास तिथे थांबणे अलकाला शक्यच नव्हते. या ट्रीटमेंटने मामी लवकरच ब-या होतील असेच तेंव्हा वाटत होते. सवडीने पुन्हा जाऊन त्यांना भेटावे असा विचार करून ती घरी आली. पण तिच्या स्वतःच्या आजारपणामुळे आणि त्यातून आलेल्या अशक्तपणामुळे त्या वेळी ते जमले नाही. मामा किंवा मामींबरोबर संपर्क नसल्यामुळे त्या हॉस्पिटलमध्ये आहेत की घरी गेल्या आहेत हेही समजायला मार्ग नव्हता. त्यामुळे शक्य झाल्यानंतरसुध्दा त्यांना कुठे जाऊन भेटायचे हे समजत नव्हते.

दहा बारा दिवसांपूर्वी आम्ही तिस-याच एका गावी गेलो असतांना मामांचा एक सख्खा भाचा तिथे आम्हाला भेटला तेंव्हा त्याच्याकडून कळले की मामी कालवश झाल्या. ही दुःखद बातमी मुद्दाम कोणालाही सांगायची नाही असे मामांनी त्यांच्या निकटवर्तीयांना सांगून ठेवले होते. त्या दोघांनीही त्यांच्या सद्वर्तनाद्वारे असंख्य माणसे जोडून ठेवली होती. ही बातमी ऐकून त्या सर्वांना धावत यावेसे वाटेल आणि त्यांना ते कष्ट पडू नयेत असा विचार त्याच्या मागे होता. कदाचित मामींनी स्वतःच तसे सांगून ठेवले असेल. त्या नेहमी दुस-यांचाच विचार करत असत. त्यामुळेच त्यासुध्दा सर्व परिचितांच्या स्मरणात चिरकाल राहणार आहेत यात शंका नाही.

Sunday, October 20, 2013

स्मृती ठेवुनी जाती - ९ - श्रीराम परांजपे ( एस.आर.परांजपे )

इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण होताच माझी अणुशक्ती खात्यात निवड झाली आणि त्यांच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये माझे प्रशिक्षण सुरू झाले. त्याची सुरुवात फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स यासारख्या विज्ञानाच्या मूलभूत शाखांच्या शिक्षणापासून झाली. निसर्गाच्या कोणत्या नियमांमुळे आणि सिध्दांतानुसार अणुशक्ती निर्माण होते याचे फिजिक्स, ती कोणकोणत्या नैसर्गिक पदार्थांपासून होते याची केमिस्ट्री आणि ते सगळे किती प्रमाणात होते याचे गणित समजून घेण्यासाठी त्याच्या संबंधातली इत्थंभूत पायाभूत माहिती असायला हवी हा यामागचा दृष्टीकोण असावा. विज्ञान आणि गणित हे विषय मला शाळेत असतांनापासून आजपर्यंत प्रिय असले तरी महत्प्रयासाने इंजिनियरिंगची डिग्री घेतल्यानंतर त्यावर काहीतरी प्रत्यक्ष काम करण्याची मी आतुरतेने वाट पहात होतो. त्यामुळे या सैध्दांतिक किंवा पुस्तकी शिक्षणासाठी त्या वेळी आमच्यापैकी कोणीच फारसा उत्सुक नव्हता.

आम्हाला हे विषय शिकवणारे कोणतेही शिक्षक कॉलेजातले प्रोफेसर नव्हते. आमच्याहून पाच सहा वर्षे वयाने मोठे आणि एकच ग्रेड वरच्या हुद्द्यावर आमच्याच खात्यात काम करणारे निरनिराळे अधिकारी येऊन थोडा थोडा भाग शिकवून जात होते. त्या काळातले आमचे ट्रेनिंग स्कूल मुंबईतल्या मरीन लाइन्सवर होते आणि आमच्या लेक्चरर्सना तिथे येण्याजाण्यासाठी ऑफिसचे व्हेइकल कधी मिळाले तर मिळत असे, कधी मिळतही नसे. त्या काळातल्या लालफितीमधून टॅक्सीभाड्याचे ऱिइंबर्समेंट मिळवणे फार जिकीरीचे काम होते आणि त्या काळातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही चांगली नव्हती. शिवाय मुलांना शिकवणे हे त्या लोकांचे मुख्य काम नव्हतेच. यामुळे त्यांच्यातल्या काहीजणांना या कामात मनापासून रस वाटत नसे. केवळ नोकरीचा भाग म्हणून ते लोक हा जुलमाचा रामराम करून जात. कधी कधी ते मरीन लाइन्सला येऊच शकत नसत आणि त्यांना दिलेला पोर्शन उरलेल्या पीरियड्समध्ये कसाबसा कव्हर करून टाकत असत. आमच्या बॅचमधली बहुसंख्य मुले मुंबईबाहेरून आलेली होती, त्यांच्या हातात पहिल्यांदाच त्यांच्या हक्काचे पैसे पडत होते, ट्रेनिंगच्या सुरुवातीला बराचसा मोकळा वेळही मिळत होता. यामुळे आम्ही बहुतेक सगळी मुले जमेल तेवढी आपापल्या जिवाची मुंबई करून घेत होतो. असा सगळा आनंद होता. 

रिअॅक्टर इंजिनियरिंग हा नवा विषय सुरू होणार असल्याची बातमी येतांच सर्व मुलांना खूप आनंद झाला. आपल्याला आता काही तरी प्रत्यक्ष कामाचे शिकायला मिळेल असे सर्वांना वाटले. त्यासाठी एस.आर.परांजपे नावाचे लेक्चरर येणार असल्याचे समजले आणि मराठीभाषी मुले जरा जास्तच खूष झाली. आम्ही त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहू लागलो. पहिल्या पीरियडची वेळ झाली तरी परांजपे सर आले नव्हते. त्यांच्या आगमनाची आणखी पाच दहा मिनिटे वाट पहायची आणि जवळच्या इराणी किंवा उडपी हॉटेलात किंवा मरीन ड्राइव्हच्या मसुद्गकिना-यावर जाऊन बसायचे असे आमचे बोलणे चालले असतांनाच ते धावतपळत आणि कपाळावरला घाम टिपत टिपत क्लासरूममध्ये येऊन धडकले. शिडशिडीत शरीरयष्टी, जाड भिंगांचा आणि जाड फ्रेमचा चश्मा, चेहे-यावर भोळसट वाटावा इतका सौम्य भाव वगैरेंमुळे त्यांचे पहिले इम्प्रेशन काही फारसे चांगले उमटले नाही. वयाने आणि हुद्द्याने ते आमच्यापेक्षा निदान बारा तेरा वर्षांनी सीनियर असले तरी आपण मोठे ऑफिसर असल्याचा कसलाच रुबाब त्यांच्या वागण्यात किंवा बोलण्यात दिसला नाही. त्या वेळी तर ते एकाद्या म्युनिसीपालिटीच्या शाळेतल्या मास्तरासारखे दिसत आणि वावरत होते, त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि पहिल्याच वाक्याच्या एका शब्दात अडखळून न्नन्नन्नन्न असा चमत्कारिक उच्चार यायला लागल्यावर तर मुलांची साफ निराशा झाली.

मागच्या बाकावर बसलेल्या मुलांची कुजबूज वाढून त्याला गोंगाटाचे रूप आले, तरीही सरांनी तिकडे अजीबात लक्ष न देता त्यांचे किंचित तोतरे बोलणे चालूच ठेवले. त्यांनी बहुधा पूर्वीच्या काही बॅचेसनाही शिकवले असावे आणि त्यांना या सगळ्याची संवय झाली असणार. समोरच्या बेंचांवर बसलेल्या मुलांवर आपले लक्ष केंद्रित करून त्यांनी शांतपणे आपला विषय शिकवायला सुरुवात केली. परांजपे सरांनी त्यासाठी भरपूर पूर्वतयारी केलेली होती. विषयावर तर त्यांचे प्राभुण्य होतेच, त्यासंबंधीची सर्व इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे त्यांच्या अगदी नखाग्रांवर (फिंगरटिप्सवर) होती. त्याची सुरेख प्रकारे मांडणी करून ती मनोरंजक पध्दतीने सांगायला त्यांनी सुरुवात केल्यानंतर मात्र बाकीची मुलेही त्यात गुंगून गेली.

बिलियर्डमधल्या चेंडूसारखा सारखा एक न्यूट्रॉन येऊन युरेनियमच्या एका अणूला धडकतो आणि त्याचे विखंडन करून त्यातून आणखी न्यूट्रॉन जन्माला येतात, ते पुढे आणखी युरेनियमच्या अणूंचे विखंडन करत जातात अशा प्रकारचे सोपे चित्र न्यूक्लियर फिजिक्स शिकत असतांना आमच्या मनात तयार झालेले होते. प्रत्यक्षातल्या रिअॅक्टरमध्ये युरेनियमचे कित्येक परार्ध अणू वास करत असतात. आणि दर सेकंदाला कित्येक अब्ज न्यूट्रॉन येऊन युरेनियमच्या निरनिराळ्या अणूला धडकत असतात किंवा इतर पदार्थांमध्ये ते शोषून घेतले जात असतात, क्षणोक्षणी जन्माला येऊन लगेच नष्ट होणा-या न्यूट्रॉन्सचा एक महाप्रचंड घोळका रिअॅक्टरमध्ये घोंघावत असतो हे एक वेगळे चित्र परांजपे सरांनी छान उभे केले. १९४२ साली डॉ.एन्रिको फर्मीने यशस्वीरीत्या तयार केलेल्या पहिल्या पाईलपासून ते पुढील दोन शतकांमध्ये झालेल्या अनेक प्रकारच्या प्रयोगांमधून अणुशक्तीचा विकास कसा होत गेला, गोल, चौकोनी, षट्कोनी, उभे. आडवे, लांबट, बसकट वगैरे निरनिराळ्या आकारांचे असंख्य प्रकारचे लहानमोठे रिअॅक्टर्स अनेक देशांमध्ये तयार केले गेले, त्यातले काही चालले, बरेचसे चाललेच नाहीत, युरेनियम, प्ल्युटोनियम यासारखी इंधने आणि त्यांच्या जोडीला साधे पाणी, जड पाणी (हेवीवॉटर), कार्बन डायॉक्साइड, सोडियम वगैरे पदार्थांचा उपयोग त्यात कसा केला गेला, त्यांचे परिणाम काय झाले, वगैरेंचे सुसंगत आणि सविस्तर असे वर्णन त्यांनी केले. हा विषय रोचक होताच, परांजपे सरांनी तो फारच चांगल्या रीतीने समजावून सांगितला. ते करता करता अमेरिका, रशीया, इंग्लंड, फ्रान्स, कॅनडा वगैरे देशांनी त्यातल्या निरनिराळ्या पध्दतींवर जास्त भर का दिला आणि भारताच्या दृष्टीने त्यातले काय शिकण्यासारखे आणि फायद्याचे आहे हेसुध्दा ते सांगत गेले. त्यांनी जे काही सांगितले ते सर्वांच्या स्मरणात पक्के रुतून बसले.

लेक्चर झाल्यानंतरसुध्दा परांजपेसर थांबून रहात, मुलांनी विचारलेल्या कोणत्याही शंकेचे उत्तर देतांना त्याचे समाधान होईपर्यंत त्याचे विवेचन करून समजावून सांगत. काही मुले अवांतर प्रश्नही विचारत. त्या काळात फॉरेनला जाण्याची प्रचंड क्रेझ होती कारण ती संधी फार थोड्या लोकांना मिळत असे. त्यामुळे "सर, तुम्हाला कधीतरी फॉरेनला जायचा चान्स मिळाला का हो?" अशी जराशी तिरकस पृच्छा एका वात्रट मुलाने करताच "निदान सात आठ वेळा तरी मी कुठे कुठे जाऊन आलो असेन." असे त्यांनी अगदी शांतपणे सांगताच वर्गातल्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अणुशक्ती खात्यात ते किती मोठ्या पोस्टवर आहेत याची तोपर्यंत कोणाला कल्पनाच नव्हती. "आमचे ट्रेनिंग संपल्यावर आम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये घ्याल का?" असे काही मुलांनी त्यांना विचारल्यावर सरांनी त्यांनाच उलट विचारले, "तुम्हाला चेस आणि ब्रिज खेळायला येते का?" हे ऐकून सगळे गारेगार झाले. परांजपे सर ज्या प्रकल्पावर काम करत होते तो मंजूरीसाठी बराच काळ सरकार दरबारी रखडत पडला असल्यामुळे त्यावर काम करणा-या लोकांना वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडला होता असा त्याचा अर्थ होता असे नंतर कळले. 

रिअॅक्टर इंजिनियरिंग या विषयाचा जेवढा भाग परांजपे सरांना दिला होता तो शिकवून संपल्यावर पुढील भागांसाठी त्यांच्या ऐवजी त्यांचेच सहकारी दिवेकर सर आले. त्यानंतरच्या काळात अणुशक्ती विभागाच्या काही कार्यक्रमांमध्ये परांजपे सर आम्हाला अधून मधून भेटत, दर वेळी त्यांना नमस्कार करताच तेसुध्दा लगेच ओळख दाखवून आमची विचारपूस करत. असा जवळ जवळ दीड वर्षांचा काळ उलटून गेला आणि परांजपे सरांचा फास्ट ब्रीडर टेस्ट रिअॅक्टर (एफबीटीआर) मार्गाला लागल्याची बातमी आली. हा प्रकल्प फ्रान्सच्या सहाय्याने उभारला जाणार होता. तोपर्यंत परांजपे सरांच्या हाताखाली काम करणारा एक लहानसा सेक्शन होता. पण प्रॉजेक्टचे काम पाहण्यासाठी त्याचा खूप मोठा विस्तार करावा लागणार होता. त्यामुळे बीएआरसीमधल्या अनेक लोकांनी त्यात सामील होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आनंद दीक्षित आणि रवीन्द्र काळे या माझ्या मित्रांचीही त्यात निवड झाली. त्यातल्या दीक्षितच्या बरोबरच मी त्या काळात एका फ्लॅटमध्ये रहात होतो. त्यामुळे "एसआरपींनी आज हे केले, ते केले, असे सांगितले, तसे सांगितले ..."  वगैरे मधून त्यांचा उल्लेख आमच्या रोजच्या बोलण्यात होऊ लागला आणि त्यामधून त्यांची एक आणखी वेगळी प्रतिमा मनात तयार होत गेली.

ते नुसते बोलघेवडे शिक्षक नव्हते, कोट्यवधी रुपये खर्चाच्या एका मोठ्या प्रॉजेक्टची संपूर्ण जबाबदारी पेलण्याची क्षमता त्यांच्यात होतीच. त्याचे सारे सविस्तर प्लॅनिंग, त्यात पडणारी कामे आणि त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ यांची जुळवाजुळव करणे, त्यानंतर ती कामे सुयोग्य सहाय्यकांना वाटून देणे, त्यांच्यामध्ये सामंजस्य राखणे ही महाकर्मकठीण कामे ते व्यवस्थितपणे सांभाळत होते. अणुशक्तीखात्यात आणि बाहेरील अनेक वरिष्ठांशी त्यांच्या चांगल्या ओळखी होत्या. ते वरून जेवढे साधेसुधे दिसायचे तेवढेच पक्के आतल्या गाठीचे होते. त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे हे सहजासहजी कोणाला कळून देत नसत. त्यांच्या काही आवडीनिवडी होत्या, छंद होते, त्यातला एक होमिओपाथी हा होता. असे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू त्यामधून समोर येत गेले. ठरल्याप्रमाणे त्यांच्या टीमसह ते वर्षभरासाठी फ्रान्सला जाऊन आले आणि लवकरच कल्पकमला चालले गेले. त्यानंतर त्यांची भेट होण्याचे योग दुर्मिळ होत गेले. त्यांचे सहकारी असलेले माझे अनेक जुने मित्र या ना त्या कारणाने कुठे ना कुठे भेटत असत तेंव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये परांजपे सरांचा नेहमी उल्लेख येतच असे. अखेरीस संचालक या पदावरून सेवानिवृत्त होऊन ते कल्याणला सेटल झाले असल्याचे त्यामधून समजले.

त्यालाही जवळ जवळ वीस वर्षे होऊन गेली. कालांतराने माझे ते मित्र आणि मी स्वतः रिटायर होऊन निरनिराळ्या शहरांमध्ये राहू लागलो. आमच्याही गाठी भेटी कमी होत गेल्या आणि झाल्या तरी आता त्यात एसआरपींचा (श्रीराम परांजपे यांचा) विषय निघणे बंद होऊन गेले. ते नाव हळूहळू विस्मरणात जात चालले होते. अचानक लोकसत्तामधल्या एका बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. ती त्यांच्या दुःखद निधनासंबंधीची होती आपली स्मृती मागे ठेऊन ते पुढे चालले गेले होते, आता यानंतर ते आता कधीच प्रत्यक्षात दिसणार नाहीत. 

--------------------------------

Monday, October 07, 2013

तेथे कर माझे जुळती - १६ - स्व. कमलाताई काकोडकर



माझ्या आयुष्यात मला प्रत्यक्ष भेटलेल्या ज्या मोठ्या व्यक्तींच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे त्यांच्याबद्दल या सदरात दोन शब्द लिहायचे असे मी पाच वर्षांपूर्वी ठरवले होते. यातल्या काही व्यक्तीबद्दल लहानमोठे ग्रंथ आणि अगणित लेख लिहिले गेले आहेत. त्या महान लोकांची समग्र माहिती एका लेखात थोडक्यात देणे मला शक्यही नाही, माझी तेवढी पात्रताही नाही आणि हे लेख लिहिण्यामागे माझा तसा उद्देशही नाही. "मी सुध्दा या थोर लोकांना भेटलो आहे." अशी शेखी मारण्याचे माझे वय आता राहिले नाही, पण त्यांना भेटल्याचा मला निश्चितच आनंद आणि अभिमान वाटतो. फक्त माझ्या कांही जुन्या व्यक्तिगत आठवणी आणि या महान लोकांचा माझ्या जीवनावर पडलेला प्रभाव यासंबंधी माझे चार शब्द मी या निमित्याने मांडणार आहे. यामुळे यातसुध्दा कदाचित थोडासा मीच डोकावलेला दिसणार याला काही इलाज नाही. या लेख मालिकेतले हे सोळावे पुष्प प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांच्या मातोश्री स्व.कमलाताई काकोडकर यांना समर्पित करीत आहे. काही दिवसापूर्वी त्यांचे वृध्दापकालाने दुःखद निधन झाले. एक दुर्मीळ असे ध्येयवादी व्यक्तिमत्त्व वर्तमानातून इतिहासात गेले! सध्या सुरू असलेल्या नवरात्राच्या दिवसात आदिशक्तीच्या आधुनिक काळामधील या रूपाचे दर्शन समयोचितच आहे.

डॉ.अनिल काकोडकर आणि मी अणुशक्तीनगर वसाहतीच्या एकाच भागात वर्षानुवर्षे रहात होतो. आमच्या क्वार्टर्स साधारणपणे एकाच प्रकारच्या होत्या, आमची मुले एकाच शाळेत शिकत होती, एकाच डिस्पेन्सरीत आम्ही वैद्यकीय कारणांसाठी जात होतो आणि रोजच्या उपयोगी वस्तू आणण्यासाठी कॉलनीमधल्या एकाच बाजारात जात होतो. इतकेच नव्हे तर आम्हाला कॉलनीच्या बाहेर कुठे जायचे असेल तर त्यासाठी आम्ही एकाच बसस्टॉपवर जात होतो. त्यामुळे अधून मधून कुठे ना कुठे आमची एकमेकांशी गाठ भेट होतच असे. काकोडकरसाहेबांच्या मातोश्री कमलाताई त्यांच्याबरोबर रहात असल्यामुळे त्यासुध्दा नेहमीच्या पहाण्यातल्या होत्या. त्यांच्या वयाचा विचार करता कॉलनीतले सगळेजण त्यांना आजीच म्हणत असत. माझे त्यांच्याशी कधीच फारसे बोलणे झाले नसले तरी माझ्या पत्नीबरोबर ते नेहमी होत असे. कमलाताईंचे वागणे बोलणे अत्यंत साधेपणाचे असायचे. कॉलनीमधल्या त्यांच्या वयाच्या इतर काही आज्या खूप बोलक्या होत्या. आपली मुले, नातवंडे वगैरेंचे कौतुक करतांना त्यांच्या जिभेवर सरस्वती नाचत असे. त्यांच्या किरकोळ कामगिरींचे पुराणसुध्दा त्या रंगवून सांगतांना थकत नसत. पण काकोडकर आजी त्या सर्वांहून फार निराळ्या होत्या. स्वतःची किंवा आपल्या कुटुंबाची बढाई करणे त्यांच्या स्वभावात नव्हते.

खरे पाहता त्यांच्याकडे सांगण्यासारखे खूप म्हणजे खूपच होते. काकोडकरसरांनी अणुशक्तीखात्याच्या प्रशालेत प्रवेश केल्यापासूनच, किंबहुना त्याच्याही आधी इंजिनियरिंग शिकत असतांनापासून नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यांची बुध्दीमत्ता, ज्ञान, कर्तृत्व, संघभावना, कामाबद्दल असलेली तळमळ, निष्ठा हे सगळेच गुण इतके उच्च स्तरावरचे होते की पहिल्या भेटीमध्येच कोणावरही त्यांची छाप पडल्याखेरीज रहात नसे. अणुशक्तीशी निगडित असलेली एकापाठोपाठ एक नवनवी आव्हानात्मक कामगिरी त्यांच्याकडे विश्वासाने सोपवली जात असे आणि ते रात्रंदिवस जिवाचे रान करून ती यशस्वीरीत्या फत्ते करून दाखवत असत. यामधून त्याच्या यशाची कमान सतत उंचावत राहिली आणि त्यांची निवड अधिकाधिक उच्च पदांवर होत गेली. डिपार्टमेंटमध्ये त्यांचे करीयर नेहमीच सुपरफास्ट ट्रॅकवर राहिले होते. काकोडकर आजींना या सर्वाचे मनापासून कौतुक आणि सार्थ अभिमान वाटत असणारच. पण तरीही त्या मितभाषीच राहल्या. मुलाच्या प्रगतीबरोबर कॉलनीमधल्या लोकांच्या मनातले त्यांचे स्थानसुध्दा उंचावत जात होतेच. अधिकाधिक लोक त्यांना जास्त मान देत होते, त्यांच्याकडे अधिक आदराने पाहिले जात होते, पण त्यांनी कधीही त्याचे भांडवल केले नाही. त्यांचे वागणे आणि बोलणे नेहमीच अत्यंत साधेपणाचे राहिले.

त्यांचे स्वतःचे जीवनसुध्दा अद्भुत किंवा कल्पनातीत वाटावे इतक्या वेगळ्या परिस्थितीमधून गेलेले होते, पण त्याबद्दल क्वचितच कुणाला माहिती झाली असेल. आजींच्या बोलण्यात त्याचा उल्लेख त्या बहुधा कधीच करत नसाव्यात किंवा जाणीवपूर्वक मुद्दाम ते टाळत असाव्यात. कॉलनीमधल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांना त्याची पुसटशीसुध्दा कल्पना कधी आली नाही. एक सुसंस्कृत, सुस्वभावी, शांत, प्रेमळ आणि कर्तबगार मध्यमवर्गीय आजी एवढेच त्यांचे व्यक्तीचित्र माझ्या मनात तयार झाले होते. याच्या पलीकडे मला त्यांच्याबद्दल काही माहिती नव्हती. त्यांनी खूप कष्ट सोसून आपल्या मुलांचा सांभाळ केला आणि त्यांना जीवनात इतक्या उंचीवर नेऊन पोचवले वगैरे अस्पष्ट कुणकुण कधी तरी कानावर आली असेल, पण त्याचा जास्त तपशील कधी समजला नव्हता. माझ्या पिढीमधल्या मध्यमवर्गातल्या, विशेषतः ग्रामीण भागातल्या अनेक मुलांनी अनेक अडचणींना सामोरे जाऊन, धडपड करून उच्च शिक्षण घेतले होते आणि त्यात त्यांच्या कुटुंबीयांनीही खस्ता खाल्ल्या होत्या हे सर्वांना माहीत असल्यामुळे कदाचित त्याला त्या वेळी फार मोठे महत्व दिले गेले नसेल.

डॉ.काकोडकर अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष झाल्यानंतर अणुशक्तीनगर सोडून मलबारहिलवरील निवासस्थानी रहायला गेले आणि आजीही तिकडे गेल्यानंतर त्यांचे दर्शन होईनासे झाले. ऑफीसातल्या वाढत्या कामाचे आणि वाढत असलेल्या कुटुंबातले इतर व्यापही वाढत गेल्यामुळे माझ्या स्मरणातून त्या जवळ जवळ बाहेर गेल्या होत्या. कमलाताई काकोडकर यांनी एक आत्मचरित्र लिहिले आहे असे अचानक मला कुणाकडून तरी समजले आणि त्या इतक्या मोठ्या व्यक्ती होत्या हे मला इतके दिवस कसे कळले नव्हते याचे नवल वाटले. त्या पुस्तकाचे नाव त्यांनी एक धागा सुताचा असे का ठेवले आहे याचा काही उलगडा लागत नव्हता.. या पुस्तकाच्या प्रकाशनाशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीकडून ही माहिती मिळाल्यावर मी त्याबद्दल चौकशी केली. ती ऐकून मी केवढा आश्चर्यचकित झालो ते सांगता येणार नाही. या पुस्तकाच्या प्रकाशनसमारंभाला उपस्थित रहाण्याचे भाग्यही मला मिळाले.   

सुप्रसिध्द गांधीवादी नेते कै.दादा धर्माधिकारी यांचे सुपुत्र आणि सुप्रसिध्द निवृत्त न्यायमूर्ती श्री.चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या पुस्तकाचे समारंभपूर्वक प्रकाशन करण्यात आले. त्यांनी खूप वर्षांपूर्वीपासून कमलाताईंना जवळून पाहिले होते. त्या काळातल्या आठवणी त्यांनी सांगितल्या. कमलाताईंचे शिक्षण महात्मा गांधीजींच्या वर्धा येथील सेवाग्राममधील महिलाश्रमात झाले. स्वतः गांधीजी आणि स्व.कस्तुरबा यांचा सहवास त्यांना लाभला आणि देशभक्तीबरोबरच सेवा, संग्राम, सहनशीलता वगैरेंचे जे संस्कार त्या कालावधीत त्यांच्या मनावर बिंबले गेले ते त्यांनी आयुष्यभर जपून ठेवले आणि पुढच्या पिढीला दिले. त्या नेहमी खादीची साधी सुती वस्त्रेच वापरत राहिल्या. सन १९४२च्या चले जाव आंदोलनात त्यांनी भूमिगत होऊन सक्रिय भाग घेतला. त्यांचे पती स्व.पुरुषोत्तम काकोडकर यांना दीर्घकाल पोर्तुगीजांच्या बंदिवासात रहावे लागल्यानंतर कमलाताईंनी मध्यप्रदेशातल्या एका लहानशा गावात आधी शिशुवर्ग सुरू करून ती शाळा वाढवत नेली आणि नावारूपाला आणली. पुढे मुलांच्या शिक्षणासाठी ती सोडून त्या मुंबईत आल्या आणि खादी ग्रामोद्योग केंद्रात काम करत राहिल्या. ज्या काळातल्या सर्वसामान्य स्त्रिया कोणाच्या सोबतीशिवाय घराचा उंबरठासुध्दा ओलांडायला घाबरत असत त्या कालखंडातला हा कमलाताईंचा खडतर जीवनप्रवास त्यांनी ज्या धैर्याने आणि जिद्दीने केला त्याला तोड नाही. कमलाताईंच्या आयुष्याचा धागा उलगडताना स्त्री जन्माची एक वेगळीच कहाणी पाहायला मिळाल्याचे चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. त्या काळातील मोठ्या माणसांच्या सहवासानंतर आताची माणसे पिग्मी वाटतात, अशी खंतही त्यांनी त्या प्रसंगी व्यक्त केली होती.

स्वत: कमलाताईंनी त्यांच्या जीवनाचा हा एक धागा सुखाचा नसून सुताचा का हे सांगताना जीवनातील चरख्याचे माहात्म्य सांगितले. स्वराज्याचा सूर्य उगवला, पण सुराज्य आले नाही, नवकोट नारायण भरपूर झाले पण गरीब माणसाचे भले झाले नाही, अशी खंत व्यक्त करतानाच कमलाताईंनी आम्ही कसे जगलो याविषयी येणाऱ्या पिढीला प्रश्न् पडू नयेत म्हणून हे पुस्तक लिहिल्याचे सांगितले. स्वातंत्र्य ते आणीबाणी, आणीबाणी ते टेलिकॉम क्रांती, टेलिकॉम क्रांती ते आजचे जागतिकीकरण असा सगळा प्रवास सजगपणे करणारी आणि त्याविषयी कसोशीने बोलण्याची इच्छा असणारी व्यक्ती म्हणजे कमलाताई असल्याचे पुस्तकाचे शब्दांकन करणारे पत्रकार चंदशेखर कुलकर्णी यांनी सांगितले. वयोमानानुसार स्वतः सगळे लिहून काढणे कदाचित कमलाताईंना आता अवघड झाले असल्यामुळे त्यांनी सांगितलेल्या हकीकती कुलकर्णी यांनी व्यवस्थितपणे लिहून दिल्या असाव्यात.

डॉ.अंजली कुलकर्णी आणि डॉ.अनुराधा हरकरे या दोन भगिनींनी मिळून फुलाला सुगंध मातीचा या नावाचे एक सुरेख पुस्तक लिहिले आहे. यात निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये शिखरावर जाऊन पोचलेल्या पाच प्रसिध्द व्यक्तींच्या जडणघडणीवर त्यांच्या मातापित्यांचा, विशेषतः त्यांच्या आईचा किती प्रभाव पडला होता हे या पुस्तकात त्यांनी दाखवून दिले आहे. यासाठी त्यांनी या पालकांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि या मुलाखतींमधून त्यांचे आगळे वेगळे व्यक्तीमत्व दिसून येते. या पुस्तकातला पहिलाच लेख स्व.कमलाताई आणि डॉ.अनिल काकोडकर यांच्यावर आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनसोहळ्यालाही मी उपस्थित राहिलो होतो. या पुस्तकाच्या लेखिकांना मुलाखत देतांना काकोडकर आजींनी सांगितले होते, "प्रत्येक आईला आपलं मूल खूप मोठं व्हावं, यशस्वी व्हावं असं वाटतं. परंतु त्यासाठी योग्यरीत्या पालकत्व निभावणं आवश्यक असतं. पालकांनी मुलांसमोर आदर्श ठेवणं, गरज पडल्यास स्वतःवरही वागणुकीची बंधनं घालणं गरजेचं असतं ..."  त्यांनी तरुण पिढीला असा संदेश दिला आहे, "रोज एक तरी काम स्वतःच्या कुटुंबासाठी सोडून दुस-या कुणासाठी तरी करून बघा, प्रत्येकाने असे ठरवले तर आपल्यासोबत दुस-याचा, पर्यायाने हळूहळू देशाचा विकास होईल."

दुनिया गोल आहे. यामुळे आपल्याला कोण कुठे आणि केंव्हा अकल्पितपणे भेटेल हे सांगता येणार नाही. माझ्या मुलाचे लग्न झाल्यानंतर काही काळाने आम्हाला समजले की आमच्या सुनेच्या आईचे (मंगलाताईंचे) माहेर खरगोणला कमलाताई काकोडकरांच्या घराजवळ होते आणि त्यांनी म्हणजे आमच्या विहीणबाईंनी त्यांच्या लहानपणी काकोडकर आजींना खूप जवळून पाहिले होते. तेंव्हाच त्या गोष्टीला निदान वीस पंचवीस वर्षे उलटून गेली होती, पण त्याचा तपशील त्यांच्या चांगला लक्षात होता. ही गोष्ट आम्ही आजींना भेटल्यावर सांगितली तेंव्हा त्यांनाही ही जुनी ओळख लगेच आठवली. त्यानंतर जेंव्हा जेंव्हा आमची भेट झाली तेंव्हा त्यांनी "आमची मंगला कशी आहे.." याची जरूर चौकशी केली. दोन तीन वर्षांपूर्वी आम्ही आमच्या दूरच्या नात्यातल्या एका मुलीच्या लग्नाला ठाण्याला गेलो होतो, तिथे काकोडकर आजी सौ.काकोडकरांना घेऊन आल्या होत्या. त्या दोघी नव-या मुलाकडच्या बाजूने आल्या होत्या. आपण कोणी व्हीआयपी आहोत असा कसलाही आभास त्यांच्या वागण्यात नव्हता. ही गोष्ट आधीपासून ठाऊक नसली तर कुणाला तसे मुळीसुध्दा वाटले नसते. भोजन संपल्यावर त्यांनी आम्हाला थोडा वेळ जवळ बसवून घेतले, अत्यंत आपुलकीने आमची चौकशी केली. तिथून आम्हाला ठाण्यातच दुस-या एका आप्तांना भेटायला जायचे होते हे आमच्या बोलण्यात येऊन गेल्यावर त्या घरी परत जातांना वाटेत आम्हालाही त्यांच्या गाडीने सोडतील अशी नुसती ऑफर दिली नाही तर आम्ही ती स्वीकारावी असा प्रेमळ आग्रह केला. पण ठाण्यातले त्यांचे घर आणि आम्हाला जायचे असल्याची जागा मंगल कार्यालयाच्या भिन्न दिशांना आहेत आणि दिवसा उजेडी आम्हाला तिथे रिक्शेने जायला कसलाही त्रास नाही वगैरे सांगून कसेबसे त्यांना ते पटवून दिले. दुस-यासाठी शक्यतो काही तरी करायला हवे असा त्यांनी नुसता संदेश दिला नव्हता, अखेरपर्यंत त्या स्वतः तसा विचार आणि आचरण करीत होत्या हे अशा छोट्या उदाहरणातून सहज लक्षात येते..

ती भेटच आमची काकोडकर आजींबरोबर झालेली अखेरची भेट ठरली. मागच्या महिन्यात त्यांची प्राणज्योत मालवल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचली आणि क्षणभर मन सुन्न होऊन गेले. स्त्रीला आदिशक्तीचे रूप का म्हणतात याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे स्व.कमलाताई काकोडकर. आम्हाला ते पहायला मिळाले, त्यांच्याकडून प्रेमाचे चार शब्द आणि शब्दाविना मिळालेली अदम्य स्फूर्ती, जीवन कसे जगावे याचा न सांगता आपल्या आचरणामधून दिलेला वस्तुपाठ मिळाला हे आमचे भाग्य.

Saturday, October 05, 2013

घटाघटाचे रूप आगळे

घटाघटाचे रूप आगळे। प्रत्येकाचे दैव वेगळे।
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार ।।

असे कवीवर्य स्व.ग.दि.माडगूळकरांनी लिहिले आहे. पन्नास वर्षांपूर्वीच्या ग्रामीण महाराष्ट्रामधील जीवनावरील या गीतात अगदी चपखलपणे बसणारी ही उदाहरणे आहेत. श्रीकृष्णाच्या गोकुळामधल्या गोपिकांपासून ते माझ्या आधीच्या पिढीमधल्या काळातल्या खेड्यांमध्ये राहणा-या घराघरातल्या गृहीणींपर्यंत सगळ्याजणी आपापल्या घरांमधले दूध, दही, लोणी वगैरे खाद्यपेय पदार्थ मातीच्या गाडग्यामडक्यांमध्ये ठेवत असत. त्या काळात स्टेनलेसस्टीलची भांडी अजून निघालेली नव्हती, काचेच्या किंवा चिनी मातीच्या पात्रांची किंमत परवडत नसे आणि त्या वस्तू खेडेगावातल्या बाजारात मिळत नसल्यामुळे मुद्दाम बाहेरून आणाव्या लागायच्या. त्या मानाने स्थानिक कुंभाराने तयार केलेली मातीची मडकी, घडे वगैरे स्वस्त आणि सहज उपलब्ध होत असत. ती फुटली तरी त्याची फारशी हळहळ वाटायची नाही. मोठे तोंड असलेली अनेक लहानमोठी मडकी घरात आणून रचून ठेवलेली असत. गरजेप्रमाणे त्यातले एक एक काढून घेऊन त्यात दूध, दही, लोणी वगैरे ठेवले जात असे. घरातला सगळा स्वयंपाक चुलींवर होत असल्यामुळे तो झाल्यानंतर चुलींमधले धगधगते निखारे वेगळ्या मडक्यात काढून ठेवले जात असत आणि तळाशी पडलेली राख वेगळी ठेवली जात असे. निखारे थंड केल्यानंतर त्याचा कोळसा पुन्हा ज्वलनासाठी वापरला जाई आणि राखेचा उपयोग भांडी घासण्यासाठी होत असे. एका चुलीतले निखारे बाहेर काढून त्यांचा उपयोग दुसरी चूल, शेगडी किंवा बंब पेटवण्यासाठी केला जात असे. अशा वेळी त्यांना इकडून तिकडे घेऊन जाण्यासाठी मातीच्याच उथळ पात्रांमध्येच ठेवले जात असे.

शहरात वाढलेल्या पुढच्या पिढीतल्या मुलांना फ्रीजमधून काढून खायचे अमूल बटरच ओळखीचे झाले असणार. मोठ्या डे-यामध्ये रवीने ताक घुसळून काढलेला ताज्या लोण्याचा गोळा त्यांना क्वचितच पहायला मिळाला असेल आणि त्या छान लोण्याच्या गोळ्याला मातीच्या मडक्यात घालून ठेवण्याची कल्पनासुध्दा कदाचित सहन होत नसेल. गॅस, ओव्हन किंवा इलेक्ट्रिक हॉटप्लेटवरच घरातला स्वयंपाक होत असल्यामुळे निखारा किंवा अंगार हे शब्दसुध्दा त्यांच्या कानावर पडले असण्याची शक्यताही कमीच आहे. कुंभाराने तयार केलेल्या एका मडक्याला लोण्याची स्निग्धता आणि मऊपणा अनुभवायला मिळतो तर तशाच प्रकारच्या दुस-या मडक्याला मात्र निखा-याचे दाहक चटके सहन करावे लागतात, हे ज्याचे त्याचे नशीब आहे हे या ओळींमधून सांगितलेले सत्य किती विदारक आहे याची पूर्ण जाणीव त्यांना कदाचित होणार नाही. त्यासाठी दुसरी उदाहरणे द्यावी लागतील.

गदिमांच्या गीतातले घट या जगातल्या माणसांची प्रतीके आहेत हे उघड आहे. मातीची सगळी मडकी कुंभारांकडून एक एक करूनच बनवली जातात, अजून तरी त्याचे यांत्रिक साचे निघालेले नाहीत. त्यामुळे ती एकासारखी एक दिसत असली तरी त्यांचा आकार, गोलाई. कडांची जाडी यात थोडा थोडा फरक असतोच. पंजाब, बंगाल, महाराष्ट्र, तामीळनाडू, किंवा जर्मनी, चीन, आफ्रिका वगैरे भागातली माणसे त्यांच्या वंशानुसार साधारणपणे सारखी दिसली तरी त्यातल्या प्रत्येकाचा चेहेरा वेगळा असतो. त्याचप्रमाणे उतरंडीमधले प्रत्येक मडके वेगळे आहे हे त्यांना निरखून पाहिल्यास समजेल. निरनिराळ्या घटाचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातोच. वर दिल्याप्रमाणे काही मडक्यांमध्ये लोणी आणि कांहींमध्ये अंगार ठेवला जातोच, काही मडकी तर अंत्यविधीच्या वेळी फक्त काही मिनिटांसाठीच वापरली गेल्यावर लगेच फोडून टाकली जातात. याच्या उलट हजार दोन हजार वर्षांपूर्वी तयार केले गेलेले काही सुबक नक्षीकाम केलेले रांजण आपल्याला पुरातनवस्तूसंग्रहालयांमध्ये (म्यूजियम्समध्ये) आजही पहायला मिळतात. जगभरातले रसिक पर्यटक त्यांना पाहण्यासाठी येतात आणि त्या रांजणांची व त्यांना बनवणा-या कारागीरांची तोंड भरून तारीफ करतात. त्यातल्या काही रांजणांमध्ये एका काळी सुवर्णमुद्रा भरून ठेवल्या गेल्या असतील आणि प्राणपणाने त्यांचे संरक्षण करणारे सैनिक त्यांच्या पहा-यावर ठेवले जात असतील.

निरनिराळ्या घटांमधल्या कशाचा उपयोग कोणत्या कामासाठी व्हावा हे ठरवण्याचा काडीमात्र अधिकार त्या पात्रांना नसतो. या बातीत काहीही करायला ती असमर्थ असतात. माणसे त्यामानाने थोडी सुदैवी असतात. माणसाचे आयुष्यसुध्दा सर्वस्वी त्याच्या नशीबावर अवलंबून असते असे गदिमांच्या गीतात ध्वनित होत असले तरी याबाबतीत माझी मते थोडी वेगळी आहेत. मी इतका सर्वस्वी दैववादी नाही. निदान काही प्रमाणात तरी माणूस स्वतःच्या प्रयत्नाने आपली वर्तमानकाळातली परिस्थिती बदलून आपले भविष्य घडवू शकतो. सर्वच बाबतीत ते शक्य होणार नसले तरी काही प्रमाणात तो यशस्वी होऊ शकतो, नशीबाने आलेल्या परिस्थितीमुळे निर्माण झालेले मनातले रागद्वेशाचे निखारे फेकून देऊन त्यांच्या जागी सुंदर, मोहक आणि कोमल भावनांची फुले गोळा करून ठेऊ शकतो, हे करता करता इतरांच्या प्रेमाचा किंवा मायेचा लोण्याचा गोळासुध्दा त्याला मिळू शकतो.

हे सगळे मला आज कां आठवले असेल? सकाळी उठून फिरायला जायला निघालो आणि शेजारी असलेल्या महात्मा गांधी कॉम्प्लेक्सपर्यंत गेलो तर तिथे कोप-यावर बरीच गर्दी जमलेली दिसली. जवळ जाऊन पाहिले तर सुंदर सजवलेल्या मटक्यांचे ढीग रचून ठेवलेले होते आणि त्या भागातल्या कोकिळाबेन, ऊर्मिलाबेन वगैरे शेठाण्या, त्यांच्या सेजल, हेतल वगैरे सुना आणि चिंकी, डिंकी वगैरे मुलींना सोबत घेऊन त्याला गराडा घालून उभ्या होत्या. एक एक घट निरखून पहात होत्या, त्यांचे आकार, त्यावर रंगवलेली नक्षी, कांचांच्या तुकड्यांना चिकटवून केलेली डिझाईन्स वगैरे पाहून पसंत केलेल्या मडक्याच्या भावावरून घासाघीस करत होत्या. या सगळ्या घटाघटांचे रूप आगळे वेगळे असले तरी त्या सर्वांचे दैव मात्र साधारणपणे सारखेच असावे. त्या सगळ्यांची आज छान पूजा केली गेली असेल, नऊ दिवस त्यांच्या सभोवती रासगरबा खेळला जाईल. त्यासाठी तयार केलेली खास गाणी लाऊडस्पीकरवर जोरजोरात वाजवली जातील, रंगीबंरंगी कपडे आणि अलंकार लेऊन सजलेल्या युवती प्रचंड उत्साहाने आणि बेभान होऊन त्या गाण्यांच्या तालावर नाचतील. त्यांची यात सतत चढाओढ होत राहील. या घटांना (ते सजीव नसतात, पण असले तर) ती सगळी मौजमजा पहायला मिळेल आणि .... नऊ दिवसांनंतर ते सगळे संपुष्टात आल्यानंतर त्यांना कोणीही विचारणार नाही, बहुधा त्यांचे आयुष्यही तिथेच संपेल, पण नऊ दिवसांचेच त्यांचे आयुष्य मात्र दिमाखात जाईल. 

Monday, September 23, 2013

गणेशोत्सवातली उणीव

प्रमोदचं लहानपण एका लहान गावातल्या मोठ्या कुटुंबात गेलं होतं. दरवर्षी गणेशचतुर्थीला त्यांच्या घरी गणपतीची स्थापना होत असे आणि त्याचा उत्सव खूप उत्साहाने साजरा केला जात असे. कळायला लागल्यापासूनच प्रमोदही त्यात हौसेने सहभाग घ्यायला लागला. गणपतीच्या मूर्तीला वाजत गाजत घरी आणण्यापासून ते त्याचे मिरवत नेत विसर्जन करण्यापर्यंतच्या सर्व काळात त्याच्या मखराची सजावट, पूजा, आरती, भजन, कीर्तन, नैवेद्य, प्रसाद वगैरे सगळ्या गोष्टींकडे तो लक्ष देऊन पहात असे आणि शक्य तितके काम अंगावर घेऊन ते उत्साहाने आणि मनापासून करत असे. स्वतःच्या प्रत्यक्ष सहभागामधून या उत्सवाची इत्थंभूत माहिती त्याने लहानपणीच करून घेतली होती. 

शिक्षण पूर्ण करून प्रमोद नोकरीला लागला, त्याने लग्न करून बि-हाड थाटले आणि तो दरवर्षी आपल्या नव्या घरात गणपती बसवायला लागला. त्याची पत्नी प्रमिलाही त्याच्याइतकीच किंबहुना त्याच्यापेक्षाही कांकणभर जास्तच उत्साही होती. दरवर्षी गणेशचतुर्थीच्या आठ दहा दिवस आधीपासूनच दोघे मिळून प्रचंड उत्साहाने तयारीला लागत असत आणि सगळे काही व्यवस्थित आणि उत्तम प्रकारे होईल याची संपूर्ण काळजी घेत. यथाकाल त्यांच्या संसारात मुलांचे आगमन झाले आणि जसजशी ती मोठी होत गेली तशी तीसुध्दा आईवडिलांना हातभार लावण्याच्या उद्देशाने त्यांच्या कामात गोड लुडबूड करायला लागली. दरवर्षीचा गणेशोत्सव आधीच्या वर्षीपेक्षा अधिक चांगला कसा करायचा याचा प्रयत्न ते दोघे करत असत. त्या उत्सवाच्या काळात ते सगळ्या आप्तेष्टांना अगत्याने त्यांच्या घरी बोलावत असत आणि दोघांचेही मित्रमैत्रिणी, शेजारीपाजारी, नातेवाईक वगैरे त्यांच्याकडे  येऊन जात, दोन घटका गप्पा मारत, चांगले चुंगले जिन्नस खात त्यांचे तसेच गणपतीच्या सजावटीचे कौतुक करत, आरत्यांमध्ये भाग घेत. एकंदरीत ते काही दिवस त्यांच्या घरात खूप धामधूम, धमाल चालत असे. सगळ्यांनाच याची इतकी सवय होऊन गेली की "आमच्याकडे गणपतीच्या दर्शनाला या" म्हणून मुद्दाम सर्वांना सांगायचीही गरज वाटेनासे झाले. उत्सव सुरू झाला की बोलावणे मिळाले नसले तरीही नेहमीचे लोक आपणहून येऊ लागले. गणेशोत्सवाचे एक बरे असते, ते म्हणजे कोणालाही येऊन जाण्यासाठी तारीख वार वेळ वगैरे ठरवावे लागत नाही. ज्याला जेंव्हा जेवढा वेळ मिळेल तेंव्हा तो डोकावून जातो आणि त्याचे त्यावेळी हसतमुखाने स्वागतच केले जाते.

अशी पंधरा वीस वर्षे गेली. प्रमोद आणि प्रमिला हे दोघेही आपापल्या क्षेत्रात प्रगतीपथावर होते, त्यांची मुले मोठी होत होती आणि कामाला मदत करू लागली होती. दरवर्षी येणारा गणेशोत्सवसुध्दा पहिल्याइतक्याच उत्साहात साजरा होत होता. पण एकदा गणेशोत्सव अगदी तोंडावर आलेला असतांना प्रमिलाला कसलेसे गंभीर आजारपण आले आणि काही दिवसांसाठी बेडरेस्ट घेणे आवश्यक झाले. तिची प्रकृती तशी काळजी करण्यासारखी नव्हती, तिच्यात हळूहळू सुधारणा होत होती, पण तिला घरातसुध्दा ऊठबस करायला आणि इकडे तिकडे फिरायला डॉक्टरांनी बंदी घातली होती. तिने लवकर बरे होण्यासाठी ती बंधने पाळणे आवश्यक होते. अर्थातच प्रमोदने ऑफिसातून रजा घेतली आणि पूर्णवेळ तो घरी राहू लागला. मुलेही आता मोठी झाली होती आणि त्याला लागेल ती मदत करत होती.

कुठलेही काम योजनापूर्वक आणि सगळ्या गोष्टी तपशीलवार ध्यानात घेऊन मन लावून करणे हा प्रमोदचा स्वभावच होता. गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी त्याने त्यासाठी लागणा-या एकूण एक वस्तूंची यादी तयार केली. दुर्वा, शेंदूर, बुक्का आणि अष्टगंध वगैरे पूजाद्रव्यांपासून ते किती प्रकारचे मोदक आणायचे इथपर्यंत सगळे लिहून काढले, ती यादी प्रमिलाला वाचून दाखवली, त्यात आणखी कशाकशाची भर घालायची ते विचारून घेतले आणि ते सगळे सामान बाजारातून घरी आणून ठेवले. दोन दिवस बसून सुंदर मखर तयार केले, त्याला रंगीबेरंगी विजेच्या माळांनी सजवले, दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले. घरी येणा-या पाहुण्यांना देण्यासाठी तीन चार प्रकारच्या मिठाया आणि तीन चार प्रकारचे टिकाऊ तिखटमिठाचे पदार्थ आणून ते डब्यांमध्ये भरून ठेवले. त्यांच्या नावांच्या चिठ्ठ्या त्या डब्यांवर चिकटवून ठेवल्या. दोन तीन प्रकारच्या थंड पेयांच्या मोठ्या बाटल्या आणून फ्रिजमध्ये ठेवल्या. पेपर डिशेस आणि प्लॅस्टिकच्या ग्लासेसची पॅकेट्स आणून जवळच ठेवली. पहिल्या दिवसाच्या पूजेसाठी भरपूर फुले आणली आणि रोज फुलांचे दोन ताजे हार आणून देण्याची ऑर्डर फूलवाल्याला देऊन ठेवली.

गणेशचतुर्थीचा दिवस उजाडण्याच्या आधीच प्रमोदने अशी सगळी तयारी करून ठेवली होती. त्या दिवशी त्याने दरवर्षाप्रमाणेच गणपतीची स्थापना करून त्याची पूजा अर्चा केली. आंब्याचे, खव्याचे आणि तळलेले मोदक, इतर मिठाया, सफरचंद, केळी, चिकू वगैरे निरनिराळी फळे या सर्वांचा महानैवेद्य दाखवला. जवळ राहणारे शेजारीपाजारी झांजांचा आवाज ऐकून आले होते त्यांना प्लेटमध्ये प्रसाद दिला. उत्सवाची सुरुवात तर नेहमीप्रमाणे अगदी व्यवस्थित झाली. एरवी त्याला रोज सकाळी नोकरीवर जाण्याची घाई असायची. यापूर्वीच्या वर्षापर्यंत घाईघाईत गणपतीला हार घालून आणि दिवा व उदबत्ती ओवाळून तो ऑफिसची बस पकडायला जात असे. या वर्षी तो दिवसभर घरीच असल्यामुळे रोज सकाळी गणपतीची साग्रसंगीत पूजा करत होता, अथर्वशीर्षाची आवर्तने करत होता, स्तोत्रसंग्रह, समग्र चातुर्मास यासारख्या पुस्तकांमधून वेगवेगळी स्तोत्रे शोधून काढून ती वाचत होता. निरनिराळ्या आरत्या म्हणत होता. "सर्वांना सुखी ठेव", विशेषतः "प्रमिलाला लवकर पूर्णपणे बरे वाटू दे" यासाठी रोज प्रार्थना करत होता.

गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जो कोणी येईल त्याचे स्वागत करणे, त्याच्याशी चार शब्द बोलणे, त्याला प्लेटमध्ये प्रसाद भरून देणे वगैरे सगळे मुलांच्या सहाय्याने तो व्यवस्थितपणे सांभाळत होता. यापूर्वी दरवर्षी हे काम प्रमिला करायची. फराळाचे सगळे डबे असे खाली मांडून ठेवणे तिला पसंत नसल्यामुळे ती एक एक डबा खाली काढून त्यात काय आहे हे पाहून प्लेट भरायची आणि खाली काढलेले डबे उचलून ठेवायला प्रमोदला सांगायची. ते करतांना तो हमखास इकडचा डबा तिकडे आणि तिकडचा तिसरीकडे वगैरे करायचा आणि त्यामुळे पुन्हा कोणासाठी प्लेट भरतांना प्रमिलाला जास्त शोधाशोध करावी लागायची. यात वेळ जात असे. शिवाय कोणी बेसनाचा लाडू खात नसला तर "खरंच तुला लाडू आवडत नाही का? थांब तुझ्यासाठी काजूकटली आणते." असे म्हणून प्रमिला आत जायची आणि "काजूकटली कुठे ठेवली गेली कुणास ठाऊक, हा पेढा घे." असे म्हणत बाहेर यायची. कधी एकादीला उपास असला तर "तुझ्यासाठी मी बटाट्याचा चिवडा आणायचा अगदी ठरवला होता गं, पण आयत्या वेळी लक्षातून राहून गेलं बघ." असे म्हणत तिच्या प्लेटमध्ये एक केळं आणून ठेवायची. पण या वर्षी असे काही होत नव्हते. जवळच्या लोकांच्या आवडीनिवडी प्रमोदला चांगल्या ठाऊक झाल्या होत्या. त्याच्या घरी आलेले लोक गणपतीचे दर्शन घेऊन, त्याला हळदकुंकू, फुले, दुर्वा वाहून नमस्कार करून आणि आरास पाहून खुर्चीवर येऊन बसेपर्यंत त्यांच्या आवडीच्या पदार्थांनी भरलेली प्लेट त्यांच्यासमोर येत होती.

प्रमोदचे मित्र त्याच्याशी आरामात गप्पा मारत बसत, त्याच्या ऑफिसातले सहकारी तर जास्त वेळ बसून त्याच्या गैरहजेरीत ऑपिसात काय काय चालले आहे याची सविस्तर चर्चा करत. जाण्यापूर्वी प्रमिलाची चोकशी करून तिला "गेट वेल सून" म्हणून जात. प्रमिलाच्या मैत्रिणी प्लेट घेऊन आतल्या खोलीत जात आणि तिच्याशी गप्पागोष्टी करत बसत. बहुतेक वेळी त्या अशा होत असत.
"अगं तुला काय सांगू? मी अशी बिछान्यावर पडलेली, आता कसला गणपती आणि कसचं काय? देवा रे, मला माफ कर रे बाबा."
"खरंच गं, मुख्य तूच नाहीस तर मग यात काय उरलंय्? तुझी सारखी किती धावपळ चाललेली असायची ते मला माहीत आहे ना."
"अगं, एक सेकंद श्वास घ्यायला पण फुरसत मिळायची नाही बघ. या वर्षी काय? जे काही चाललंय तसं चाललंय्" .... वगैरे वगैरे
शेजारच्या खोलीत चाललेला हा संवाद प्रमोदच्या कानावर पडायचा पण त्याला त्याचा अर्थ समजत नव्हता.
"मी काही विसरतोय का? माझ्याकडून गणपतीचं काही करण्यात राहून जातंय का?" असं त्यानं प्रमिलाला विचारून पाहिलं. त्यावर "मी कुठं असं म्हणतेय्?" असं म्हणून ती त्याला उडवून लावायची आणि आणखी एकादी मैत्रिण आली की पुन्हा तेच तुणतुणं सुरू करायची. त्यामुळे "या वर्षीच्या उत्सवात कोणती उणीव राहिली?" या प्रश्नाचा भुंगा प्रमोदच्या डोक्यात भुणभुणत राहिला.

त्या वर्षातला गणपतीचा उत्सव संपला, पुढे प्रमिलाही पूर्ण बरी होऊन हिंडूफिरू लागली, त्यांच्या संसाराची गाडी व्यवस्थित रुळावर आली. वर्षभराने पुन्हा गणेशचतुर्थी आली. पूर्वीप्रमाणेच दोघांनी मिळून सगळी खरेदी, सजावट वगैरे केली. गणपतीच्या मूर्तीची स्थापना, पूजा आरती वगैरे झाले. प्रमिला नेमके काय काय करते आहे यावर मात्र या वेळी प्रमोद अगदी बारीक लक्ष ठेवून पहात होता. दुपारचा चहा होऊन गेल्यानंतर काही वेळाने प्रमिलाच्या दोन तीन मैत्रिणी आल्या आणि तिच्या खोलीत त्यांची मैफिल जमली. प्रमिलानं तिच्या कपाटातल्या सगळ्या साड्या काढून पलंगावर ठेवल्या आणि त्यांच्याबद्दल चर्चा सुरू झाल्या. त्यातली एक चांगली दिसणारी साडी हातात घेऊन प्रमिलानं विचारलं, "आज संध्याकाळी मी ही साडी नेसू का?"
"कुठे बाहेर जाणार आहेस का?"
"छेः गं, आज ही कसली बाहेर जातेय्? आता हिच्याच घरी सगळे लोक येतील ना?"
"हो, म्हणून तर जरा नीट दिसायला नको का?"
"ही साडी तशी ठीक आहे, पण जरा जुन्या फॅशनची वाटते ना?" 
"मग तर छानच आहे, लोकांना एथ्निक वाटेल."
"इतकी काही ही जुनीही नाहीय् हां. पण ठीक आहे, ही बघ कशी वाटतेय्?"
"अगं मागच्या महिन्यात त्या सुलीच्या घरी फंक्शनला तू हीच साडी नेसली होतीस. ही नको, ती बघ छान आहे."
"पण महिला मंडळाच्या मागच्या मीटिंगला मी ही साडी नेसले होते, आज त्यातल्या कोणी आल्या तर त्या काय म्हणतील?"
"हो ना? हिच्याकडे एकच साडी आहे की काय? असंच म्हणायच्या, महाखंवचट असतात त्या."
या चर्चा चालल्या असतांना बाहेर ताईमावशी आल्याची वर्दी येते.
"त्यांना पाच मिनिटं बसायला सांगा हं, मी आलेच." असे प्रमोदला सांगून प्रमिला एक साडी निवडते, ती परिधान करते आणि पंधरा वीस मिनिटांनी बाहेर येते. ताईमावशी तिच्याच दूरच्या नात्यातल्या असतात. त्यांच्याशी काय बोलावे हे प्रमोदला समजत नाही. महागाई, गर्दी, आवाज प्रदूषण, ताज्या बातम्या वगैरेंवर काही तरी बोलत तो कसाबसा वेळ काढून नेतो.
ताईमावशी थोडा वेळ बसून बोलून गेल्यानंतर प्रमिला पुन्हा आत जाते. मैत्रिणी तिची वाट पहातच असतात.
"ही साडीसुध्दा नेसल्यावर छान दिसते आहे हं, पण बाकीच्याचं काय?" मग प्रमिला कपाटातले ख-या खोट्या दागिन्यांचे सगळे बॉक्स बाहेर काढते. त्यातला एक एक उघडून "अय्या कित्ती छान?", "कुठून घेतलास गं?" "केवढ्याला पडला?" वगैरे त्या अलंकारांचं साग्रसंगीत रसग्रहण सुरू होते. त्याला फाटा देत "यातलं मी आज काय काय घालू?" असे म्हणत प्रमिला मुद्द्याला हात घालते.
त्यावर मग "हे छान दिसेल.", "नाही गं, या साडीला हे इतकं सूट नाही होत, त्यापेक्षा हे बघ.", "तुझ्या हॉलमधल्या लाइटिंगमध्ये हे फँटास्टिक दिसेल बघ." वगैरे चर्चा सुरू असतांना बाहेर आणखी कोणी येतात.
"हे लोक सुध्दा ना, एक मिनिट निवांतपणे बसून काही करू देणार नाहीत" असे काही तरी पुटपुटत ती त्यातला एक सेट गळ्यात, कानात, हातात वगैरे चढवून बाहेर यायला निघते.   
"अगं, अशीच बाहेर जाणार? जरा आरशात तोंड बघ, घामानं किती डबडबलंय?"
मग प्रमिला घाईघाईत तोंडावरून हात फिरवते, मुखडा, केस वगैरे थोडे नीटनीटके करून बाहेर येते. तोपर्यंत आलेली मंडळी तिची वाट पाहून "आम्हाला आज आणखी एकांकडे जायचे आहे" असे सांगून निघून गेलेली असतात. ती फणफणत पुन्हा आत जाते. जरा साग्रसंगीत तयार होऊन बाहेर येते. त्यानंतर आलेल्या मंडळींना हसतमुखाने सामोरी जाते, त्यांची चांगली विचारपूस, आदरातिथ्य वगैरे करून दमून जाते. शिवाय पलंगावर पडलेला तिच्या साड्यांचा ढीग तिची वाट पहात असतो. त्याला एका हाताने बाजूला सारून आणि अंगाचं मुटकुळं करून उरलेल्या जागेत पडल्या पडल्या ती झोपी जाते.

हे सगळं पाहून झाल्यावर प्रमोदच्या डोक्यातला भुणभुण करणारा भुंगा मात्र शांत होतो. "मागल्या वर्षीच्या गणेशोत्सवात प्रमिलाला कोणती उणीव भासत होती? ती काय मिस् करत होती?" या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळाले होते.

Wednesday, September 18, 2013

अनंतचतुर्दशी

'अनंत' या शब्दाने माझा लहानपणापासून पिच्छा पुरवला आहे. साठसत्तर वर्षांपूर्वी हे नाव खूपच प्रचलित असायचे. अनंतराव, अंतूशेठ, अनंता, अंत्या वगैरे नावांनी ओळखली जाणारी निदान शंभर तरी लहानमोठी मुलेमाणसे आमच्या गावात होती आणि त्यातली चारपाच तरी आमच्या अगदी जवळची आणि नेहमी आमच्या घरी येणारी होती. 'आनंद' हे नाव धारण करणारी मोठी माणसे नव्हतीच आणि मुलेसुध्दा त्या मानाने अगदी कमी होती. त्यामुळे कुठेही माझे नाव मी 'आनंद' असे सांगितले तरी ऐकणारा माणूस ते 'अनंत' असेच लिहून घेत असे आणि हे आजतागायत होत आले असल्याने मी केलेल्या खर्चासाठी मिळालेल्या शेकडो पावत्या 'अनंत' या नावाने फाडल्या गेल्या आहेत, या नावाने मला प्रवास करावा लागला आहे आणि या नावाने माझ्यासाठी उद्घोषणा (अनाउन्समेंट्स) झालेल्या ऐकून त्यांना प्रतिसाद दिला आहे. हळूहळू मलाही त्याचे काही वाटेनासे झाले आहे. पण सरकारदरबारी महत्व असलेल्या कागदपत्रांमध्ये मात्र माझे नाव चुकीचे लिहिले जाऊ नये यासाठी मला थोडी धडपड करावी लागली आणि ते तसे झाल्यानंतर त्या चुका दुरुस्त करून घेण्यासाठी हेलपाटे घालावे लागले आहेत.  मुंबईला आल्यानंतर मात्र 'अनंत' नावाची माणसे भेटणे कमी कमी होत गेले आणि मला भेटणा-या 'आनंदां'ची संख्या वाढत गेली, काही परमानंद, नित्यानंद आणि सदानंदही भेटले. नंतर त्यांची संख्याही कमी होत गेली आणि स्वानंद, आमोद वगैरे त्या नावाचे नवे अवतार येत गेले. सध्याच्या नव्या पिढीतले कोणतेच जोडपे त्यांच्या मुलाला 'अनंत' हे नाव आता ठेवत नसेल.

'अनंत' या नावाचा अर्थ खरे तर खूप मोठा आहे. 'ज्याला अंत नाही' असा तो होतो. अमित, अगणित, असंख्य, इन्फिनिटी यासारखी ही एक अचाट कल्पना आहे किंवा कल्पनातीत अशी संख्या आहे, त्याचा कालावधी कधीही न संपणारा इतका आहे. असे स्वरूप फक्त परमेश्वराचेच असू शकते. भगवान विष्णूच्या सहस्रनामांमधले हे एक प्रमुख नाव आहेच, पण नवनागस्तोत्राची सुरुवात अनंतं वासुकी शेषं अशी होते. केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम् (त्रिवेन्द्रम्) येथील पद्मनाभस्वामीचे मंदिर खूप मोठे आणि प्रसिध्द आहे. त्याला अनन्तपद्मनाभदॆवालयः असेही म्हणतात. त्यामधले अनंत हे नाव शेषाचे आहे की विष्णूचे आहे की त्या दोघांचे आहे असा संभ्रम पडतो. शेषशायी विष्णूची भव्य अशी आडवी मूर्ती या देवळात आहे. 

अनंतचतुर्दशी हा वर्षातला एक दिवसच अनंताच्या नावाने ओळखला जातो. भाद्रपद महिन्याच्या शुध्द चतुर्थीला हे नाव दिलेले आहे. या दिवशी अनंतचतुर्दशीचे एक व्रत केले जात असे. त्या दिवशी शेषशायी विष्णूच्या प्रतिमेची आणि एका विशिष्ट दो-याची पूजा करून तो मंतरलेला दोरा मनगटावर गुंडाळायचा आणि पुढल्या वर्षी अनंतचतुर्दशीला पूजा करून तो बदलायचा असे चौदा वर्षे करायचे असे नियम होते. हे फार क़डक व्रत आहे आणि ते पाळले गेले नाही तर फार मोठे दुष्परिणाम होतात वगैरे भीतीपोटी सहसा कोणी ते व्रत करत नसत. असे मी लहानपणी ऐकले होते. आता तर या व्रताचा मागमूसही कुठे दिसत नाही.

पण दरवर्षी अनंतचतुर्दशी प्रचंड प्रमाणात गाजते ती मात्र गणपतीविसर्जनासाठी. त्याचा गाजावाजा, गोंगाट आणि धामधूम वाढतच आहे. गणेशचतुर्थीला प्रतिष्ठापना केलेल्या गणपतीच्या मूर्तीची दहा अकरा दिवस भक्तीभावाने पूजा केल्यानंतर अनंतचतुर्दशीच्या दिवशी तिचे समारंभपूर्वक पाण्यात विसर्जन केले जाते. घरांमध्ये बसवलेल्या गणपतींच्या उत्सवांचे दीड, तीन, पाच, सात वगैरे दिवस कालावधी असतात. वंशपरंपरेमधून ते चालत आलेले असतात. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाल्यापासून त्यांचा कालावधी अनंतचतुर्दशीपर्यंत ठरवला गेला आणि त्याचे पालन होत राहिले आहे. ज्या मंडळांना इतके दिवस उत्सव करणे शक्य नसते ते आपल्या गणपतींचे विसर्जन आधी करून घेतात, पण बहुतेक सगळे प्रमुख गट मात्र त्यांच्या उत्सवमूर्तीचे अनंतचतुर्दशीच्या दिवशीच विसर्जन करतात. हा कार्यक्रम प्रचंड मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि त्यात सामील होणा-यांची संख्याही अगणित असते.

नोकरीसाठी मी मुंबईला आल्यानंतर पहिली अनेक वर्षे माझे ऑफिस दक्षिण मुंबईत होते. अनंतचतुर्दशीच्या दिवशी बाहेर कुठेही मीटिंग किंवा व्हिजिटला जाण्याचा प्रश्नच नसायचा, आमच्या ऑफिसातली उपस्थितीही रोडावली असल्यामुळे त्या दिवशी महत्वाच्या बैठका ठेवल्या जात नसत. रस्त्यावरील तुडुंब वाहणारी गर्दी, त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी वगैरेंचा विचार करून दोन तीन तास आधीच घरी जाण्याची परवानगी मिळत असे. त्यानंतर आम्ही तीनचार मित्र मिळून ठिकठिकाणच्या मिरवणुका पहात हिंडत असू आणि आमच्या ग्रुपमधल्या शेवटच्या मित्राला कंटाळा येईपर्यंत फिरून झाल्यानंतर आपापल्या निवासस्थानी परतत असू.  लहानमोठे असंख्य गणपती, त्यांचे देखावे वगैरेंमधून त्याची कोटीकोटी रूपे त्या काळात मला पहायला मिळाली. लग्न झाल्यानंतर  मात्र या तोबा गर्दीत सहकुटुंब जाणे आणि परतणे शक्य नसल्यामुळे आम्ही थोडा लहानसा फेरफटका मारून सुखरूप परतत होतो.

योजना प्रतिष्ठानशी आमचा संबंध आल्यानंतर दर वर्षी अनंतचतुर्दशीला एक वेगळा कार्यक्रम निश्चित झाला. परळच्या ऑव्हरब्रिजला लागूनच असलेल्या एका चाळीतल्या खोलीत या प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी अनंतचतुर्दशीच्या दिवशी संगीत भजनाचा लहानसा घरगुती पण चांगल्या दर्जाचा कार्यक्रम केला जात असे आणि त्यात स्व.शिवानंद पाटील, योजनाताई आणि त्यांचे निवडक शिष्यगण भक्तीपूर्ण गायनसेवा सादर करीत असत. बाहेरील रस्त्यावरून जात असलेल्या मिरवणुकांमध्ये चाललेला ढोलताशांचा गजर आणि त्याच्यावर आवाज काढून बंदिस्त खोलीत केलेले ते गायन यात एक वेगळा रंग येत असे. संध्याकाळच्या सुमारास घरी परत येतांना आमची बस मुंगीच्या पावलाने चालत असे आणि उलट दिशेने समुद्राकडे जाणारे खूप गणपती पहायला मिळत असत.


आज अनंतचतुर्दशी आहे. मुंबई, पुणे, नागपूर, इन्दौर वगैरे सर्वच प्रमुख शहरांमध्ये या विसर्जनांच्या भव्य मिरवणुकी निघायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक मंडळामधील गणपतीसोबत त्या भागातले किंवा त्याच्याशी संबंधित असलेले सगळे लोक त्या मिरवणुकींमध्ये सामील होतातच, शिवाय या मिरवणुकी पहायला ज्याला ज्याला शक्य असलेल तो त्या पहायला जातो. मुंबईला मोठा समुद्रकिनारा लाभलेला असल्यामुळे गिरगाव, दादर, जुहू वगैरे अनेक ठिकाणी हे विसर्जन होते, पण त्यांच्या जागा ठरलेल्या आहेत. लालबागपासून दादर जवळ असले तरी लालबागचा राजा आणि त्या भागातले मोठे गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवरच वाजत गाजत नेले जातात. टेलिव्हिजनवर या मिरवणुकींचे वृत्तांत दाखवले जात असल्याने घरात राहिलेले सगळेजण आता टीव्हीसमोर बसलेले आहेत. तेंव्हा मीसुध्दा हा लेख इथे आटोपता घेऊन आता तिकडे चाललो आहे.
गणपतीबाप्पा मोरया । पुढच्या वर्षी लवकर या।।
-----------------------------------------

Monday, September 16, 2013

वक्रतुंड महाकाय



मी शाळेत असतांना वर्गातल्या बाकीच्या सगळ्या मुलांपेक्षा वयाने आणि चणीनेही लहान असल्यामुळे त्यांना थोडा घाबरत असे. त्यातल्या कोणाला "अरे वाकड्या तोंडाच्या" अशी हाक मी मारली असती तर त्याने माझा एक गाल सुजवून माझेच थोबाड वाकडे करून टाकले असते आणि कोणाला जर मी "ढबाल्या" म्हंटले असते तर त्याच्या गुबगुबीत हाताचा ठोसा मला खावा लागला असता. त्यामुळे असले काही धाडस करायची माझी हिंमत झाली नसती, पण आपले गणपतीबाप्पा कधी असे रागावत नाहीत. मला कळायलाही लागायच्या आधीपासून "वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ।" हा त्यांचा श्लोक कानावर पडून मला तोंडपाठ झाला होता आणि मीसुध्दा इतर बडबडगीतांबरोबरच "वक्कतुंड म्हाकाय सुल्यकोटी समप्पब" असे काही तरी बडबडू लागलो होतो. त्या शब्दांच्या उच्चारणात हळूहळू सुधारणा होत गेली आणि मी ते व्यवस्थित म्हणू लागलो. तेंव्हापासून ते आजतागायत जगातल्या कुठल्याही ठिकाणच्या, अगदी इंग्लंड अमेरिकेतल्यासुध्दा, एकाद्या देवळात गणेशाची मूर्ती दिसली की त्याला हात जोडून नमस्कार करताच हा श्लोक माझ्या ओठावर येतो. मुंबईतल्या कुठल्याही रस्त्याने जात असतांना वाटेत गणेशोत्सवाचे मंडप लागतात आणि आत जाऊन मंगलमूर्तीचे दर्शन घेतांना हा श्लोकही म्हंटला जातो. असे गेल्या आठवड्यात रोज घडत आले आहे.

कोणत्या ऋषीमुनीने हा श्लोक लिहिला आहे हे काही मला ठाऊक नाही, पण गणपतीच्या सहस्रनामांमधले 'वक्रतुंड' हेच नाव त्यांना या श्लोकात घ्यावेसे का वाटले कोण जाणे, 'महाकाय' याचा अर्थ 'आडव्या अंगाचा' असा न घेता शक्तीशाली, सामर्थ्यवान असाही घेता येईल. या देवाचा मुखडा आणि शरीरयष्टी कशीही (कदाचित भयभीत करणारी) असली तरी त्याचे तेज कोटी सूर्यांइतके दिपवून टाकणारे आहे असे या श्लोकाच्या पहिल्या चरणात लिहिले आहे. पण त्या महाशक्तीला वंदन, नमन वगैरेसुध्दा न करता "निर्विघ्नम् कुरुमे देव सर्वकार्येशु सर्वदा" म्हणजे "माझ्या सगळ्या कार्यांमध्ये येणारी विघ्ने सर्व वेळी दूर कर" अशी प्रार्थना किंवा मागणे या श्लोकाच्या पुढल्या ओळीत मांडले आहे. पहिल्या शब्दात त्याला नावे ठेवायची आणि पुढे लाडीगोडी लावून त्यालाच नेहमी आपली मदत करायला सांगायचे असे या श्लोकाचे स्वरूप दिसते. चांगली बुध्दी, स्वर्ग, मोक्ष, संपत्ती, शांती यातले काही न मागता आपल्या कामातले अडथळे तेवढे दूर करण्याची ही विनंती या श्लोकात आहे. देवाच्या कृपेने आपला मार्ग निर्विघ्न झाला की आपले काम आपल्या प्रयत्नानेच तडीला न्यायचे, आपले यश आपण मिळवायचे, ते आयते हातात पडायला नको असा एक चांगला विचार त्यात दिसतो.  

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ । निर्विघ्नम् कुरुमे देव सर्वकार्येशु सर्वदा।।

या श्लोकाच्या पाठोपाठ म्हंटला जाणारा श्लोक आहे,
गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती । पंचैतैनि स्मरेन्नित्यम् आयुःकामार्थसिध्दये।।

आयुष्यात आपल्याला पाहिजे असलेले सगळे काही साध्य करून घेण्यासाठी गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती या पाचजणांचे स्मरण करावे असा या श्लोकाचा अर्थ आहे. यातला गणनाथ म्हणजेच गणपती हा सर्व गणांचा म्हणजे देवांच्या सर्व सेवकांचा प्रमुख आहे. सगळे काही करणे वा न करणे, करू देणे वा न देणे हे  त्याच्या हातात आहे. सरस्वती ही विद्या, कला वगैरेंची देवता आहे. रवी शुक्र आणि बृहस्पती हे नवग्रहांमधले प्रमुख ग्रह आहेत, त्यातला सूर्य अत्यंत तेजस्वी, प्रखर आणि जीवनाधार आहे. शुक्र आणि गुरू हे अनुक्रमे दैत्य आणि देवांचे गुरू होते. त्यांच्या सैन्यांना युध्दामधले सारे कौशल्य आणि डावपेच ते शिकवत असत. बृहस्पती हे अत्यंत बुध्दीमान आणि विद्वान तर शुक्राचार्य हे अत्यंत धोरणी समजले जात असत. पुराणातल्या सर्व लढायांमध्ये शेवटी देवांचाच विजय होत असला तरी पराभवाने निष्प्रभ झालेल्या असुरांना शुक्राचार्य संजीवन देऊन पुन्हा बलिष्ट बनवण्याचे काम करत असत. सामर्थ्य, कलाकौशल्य, तेज, बुध्दीमत्ता, विद्वत्ता, चतुराई हे सगळे गुण अंगात बाणवले तर माणूस आपल्या आयुष्यात यशस्वी होणारच.  शुक्र आणि बृहस्पती यांना विकार आणि विवेक यांची प्रतीके असेही बहुधा मानता येईल. 'सगळे काही' मिळवायचे असल्यास या दोघांचीही मदत लागेलच, शिवाय शक्ती, युक्ती, कौशल्य वगैरेही पाहिजेत. 

 -------------------------------------
  • पंचैतैनि स्मरेन्नित्यम् " ----- ह्यानंतर " वेदवाणीप्रवृत्तये " असं मला का आठवते कोण जाणे  
    अशी प्रतिक्रिया एका सुविद्य भगिनीने फेसबुकावर दिली होती.

    यावर मी थोडेसे संशोधन करून खाली दिलेले स्पष्टीकरण देत आहे.
     माझ्या लेखनातली चूक दाखवल्याबद्दल धन्यवाद. मी हा श्लोक फक्त आठवणीमधून लिहिला होता आणि मला वाटला तसा त्याचा अर्थ काढला होता. गूगलवरून शोध घेता असे दिसते की हा श्लोक गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पतिन् ।
    पञ्चैतानि स्मरेन्नित्यं वेदवाण
    ी प्रवृत्तये ॥ असाच आहे. आयुष्कामार्थ सिध्दये हा भाग खालील श्लोकाचा आहे. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
    भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये ॥१॥



Tuesday, September 10, 2013

गणपतीची आरती - २ - शेंदुर लाल चढायो

'सुखकर्ता दुखहर्ता' ही गणपतीची आरती आमच्या घरी रोज म्हंटली जात होतीच, गणेशोत्सवामध्ये त्याच्या जोडीला एक हिंदी आरती म्हंटली जात असे. राष्ट्रभाषेचा परिचय होत असतांना सुरुवातीच्या काळात त्या भाषेतल्या ज्या रचना मी म्हंटल्या असतील त्यातली ही एक होती. या आरतीची सुरुवात अशी होती,
शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको ।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ॥
हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको ।
महिमा कहे न जाय लागत हूँ पदको ॥१॥
श्रीगणेशाला लाल रंगाचा शेंदूर अंगभर लावलेला आहे, शंकरपार्वतीच्या या मुलाचे लंबोदर (विशाल पोट) त्यामुळे छान लालचुटुक दिसते आहे, त्याच्या हातात गुळाचा लाडू आहे, अशा या गजाननाचा महिमा साधुसंतांना आणि देवाधिकांनाही सांगता येणार नाही इतका महान आहे, मी त्याच्या पायावर लोटांगण घालतो आहे.

त्यानंतर ध्रुवपदात त्याचा जयजयकार केला आहे.
जय जयजी गणराज विद्या सुखदाता ।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥ ध्रु० ॥
विद्या आणि सुख दोन्ही देणा-या गणगायाचा जयजयकार असो, तुमचे दर्शन घेऊन मी धन्य झालो, माझे मन त्यात रमून जाते.

दुस-या कडव्यात गणपतीचे सविस्तर वर्णन केलेले आहे.
अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी ।
विघ्नविनाशन मंगलमूरत अधिकारी ॥
कोटीसुरजप्रकाश ऐसी छबि तेरी ।
गंडस्थलमदमस्तक झुले शशिबिहारी ॥जय० ॥२॥
आठही सिध्दी याच्या दासी आहेत, त्याच्या आज्ञेनुसार त्या वागतात, हा संकटांचा वैरी आहे, त्यांचा नाश करतो, हा मांगल्याची मूर्ती आहे, कोटी सूर्यांइतका हा तेजस्वी आहे मदमस्त हत्त्तीच्या (त्याच्या) झुलत असलेल्या मस्तकावर चंद्रकोर आहे. अशा श्रीगणरायाचा जयजयकार.

या गजाननाची भक्ती करणा-याला कोणते लाभ मिळतात हे या आरतीच्या तिस-या कडव्यात सांगितले आहे.
भावभगतसे कोई शरणागत आवे ।
संतति संपति सबही भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ॥ जय० ॥३॥
जो कोणी भक्तीभावाने त्याला शरण जातो त्याला भरपूर संतती आणि संपत्ती मिळते, आजच्या जमान्यात खूप मुले होणे हे वरदान कोणाला परवडणारे नाही, पण तीनचारशे वर्षांपूर्वी जितकी जास्त वंशवृध्दी होईल तितके ते चांगले मानले जात असे. असे हे महाराज मला अत्यंत प्रिय आहेत म्हणून हा गोसाव्याचा मुलगा दिवसरात्र त्यांचे गुणगान करत असतो. श्रीगणरायाचा जयजयकार असो.

ही आरती हिंदी भाषेत असली तरी त्याची चाल आणि त्यातला भाव मराठी भाषेतल्या आरत्यांसारखाच वाटतो. माझ्या ओळखीतले सगळे हिंदी भाषिक जय जगदीश हरे या चालीवरच्या आरत्याच नेहमी गातात. 'शेंदूर लाल चढायो' ही आरती मी कधीच त्यांच्या तोंडी ऐकली नाही. 'गोसावीनंदन' या नावाविषयी मी थोडी माहिती गुगलून काढली. ती खाली दिली आहे, पण तो गाणपत्य होता एवढाच संदर्भ जुळतो. बाकीच्या माहितीचा या हिंदी आरतीशी कसलाच धागा जुळत नाही. त्यामुळे ही आरती लिहिणारा गोसावीनंदन कदाचित वेगळा असेल. त्याने ती कोणासाठी लिहिली याचा बोध होत नाही.

''गोसावीनंदन.- याचें नांव वासुदेव असून बापाचें नांव गोस्वामी (गोसावी) होतें. हा तंजावरकडील राहणारा असून याचे गुरु गोपाळश्रमगजानन नांवाचे होते. अर्वाचीनकोशकार याच्या गुरूंचें नांव निरंजनस्वामी असें देतात. याचा काल इ. स. १६५०-१७०० चा होय. याचा मुख्य ग्रंथ ज्ञानमोदक नावाचा असून शिवाय सीतास्वयंवर व अभंग, पदें वगैरे स्फुटकाव्य बरेंच आहे. यांचीं स्तोत्रें व अष्टकें लहान मुलांनां शिकतां येतील अशीं सोपीं व साधीं आहेत; हा गाणपत्य होता''
----------------------------------------

Monday, September 09, 2013

गणपतीची आरती - सुखकर्ता दुखहर्ता


माझ्या लहानपणी आमच्या गावातले सगळे रस्ते मातीचे होते, रस्त्यांच्या दोन्ही कडांना उघडी गटारे असायची, त्यांच्या बाजूला इतरही घाण केलेली किंवा टाकलेली असायची आणि काही गलिच्छ प्राणी त्यातून स्वैर हिंडत असायचे. रस्त्यातल्या विजेच्या खांबांवरचे दिवे कधी पेटलेच तरी अगदी मिणमिणता उजेड देत. त्यामुळे रात्रीच्या अंधारात त्या तसल्या रस्त्यांवरून फिरायला नकोसे वाटत असे. दिवेलागणी होईपर्यंत आम्ही सगळेजण आपण होऊनच घरी परतत होतो. त्यावेळी घरातला महिला वर्ग रात्रीच्या जेवणासाठी स्वयंपाकात गुंतलेला असायचा आणि आम्ही मुले घरी आल्यानंतर शुभंकरोती आणि परवचा म्हणून झाल्यावर श्लोक, गाणी वगैरे म्हणत बोलावण्याची वाट पहात असू. स्वैपाक पुरा होत आला की "दुपार्तीला या रे" अशी हाक यायची आणि घरातले सगळे जण देवासमोर येऊन उपस्थित होत असत. "या वेळच्या आरतीला 'दुपारती' असे का म्हणतात?" असे मी एकदा मोठ्या भावाला विचारले, तेंव्हा त्याने उत्तर दिले "अरे आपण दुपारी शाळेत असतो ना? म्हणून ती संध्याकाळी करतात." त्याचे खरे नाव 'धूप आरती' असे असते हे ज्ञान खूप उशीराने झाले. पण त्याने काही फरक पडला नाही, कारण आमच्या घरातल्या 'दुपारती'मध्ये सहसा धूप नसायचाच, ती निरांजन ओवाळूनच केली जात असे. दररोज करण्याच्या या आरतीत फक्त दोनच आरत्या म्हंटल्या जात. गणपतीची आरती दररोज म्हणायची आणि सोमवारी शंकराची, मंगळवार व शुक्रवारी देवीची, बुधवारी विठोबाची, गुरुवारी दत्ताची व शनिवारी मारुतीची आरती म्हणायची हा कार्यक्रम खंड न पाडता कित्येक वर्षे चालत आला होता.

संध्याकाळच्या वेळेला भुते, पिशाच्चे, दुष्टआत्मे वगैरे मोकळे हिंडत असतात आणि आरत्यांचे आवाज ऐकून ते घाबरून दूर पळून जातात असे सांगितले जात असे. त्यांना जास्तच घाबरवण्यासाठी आम्ही जोरजोरात झांजा वाजवून आणि तारस्वरात आरत्या म्हणत असू. आजकाल नावापुरते सायन्स शिकलेले काही लोक निगेटिव्ह व्हायब्रेशन्स, निगेटिव्ह एनर्जी वगैरे शब्द वापरतात, त्यांनाही कसली तरी अनामिक भीती वाटत असते. आरत्यांचा ध्वनीच प्रभावी समजला जात असल्यामुळे त्यातल्या शब्दांकडे कोणी लक्ष देत नसत. योग्य तो ध्वनि उत्पन्न करण्यासाठी फक्त त्यांचा उच्चार बरोबर यायला हवा, अर्थ समजून घेण्याचे काही कारण नसायचे. पण माझा स्वभाव थोडा चिकित्सक असल्यामुळे मला तो समजून घ्यावा असे वाटत असे. त्यातल्या कुठल्या शब्दांमुळे किंवा वाक्यांमुळे भुतांना घाबरायला होते याचे कुतूहलही वाटत होते. गणपतीची आरती रोजच कानावर पडत असल्यामुळे मला बोलायला लागण्याबरोबर ती आरती आपोआप पाठ झाली होती. या आरतीतले सगळे शब्द अगदी सोपे आहेत. तरीही आज गणेशचतुर्थीच्या दिवशी त्याचा अर्थ समजून घेण्याचा थोडा प्रयत्न करू.

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।।
या पहिल्या ओळीतल्या पहिल्या दोन शब्दांचे अर्थ सुख करणारा (देणारा) आणि दुःखाचा नाश करणारा असे होतात, पण पुढे विघ्नाची वार्ता कशाला? त्याचे उत्तर पुढील ओळीत आहे.
नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची।।
म्हणजे विघ्नाची वार्ता नुरवी, तिला शिल्लक ठेवत नाही, शिवाय प्रेमाचा पुरवठा करते अशी ज्याची कृपा आहे. अशा त्या गणपतीचे वर्णन पुढील ओळींमध्ये आहे.
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।।
कंठी झळके माळ मुक्ता फळाची।।
त्याने सर्वांगाला शेंदुराची उटी लावली आहे आणि चमकदार मोत्याची माळ गळ्यात परिधान केली आहे. अशा त्या मंगलमूर्ती गणेशाचा जयजयकार ध्रुवपदात केला आहे.
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती ।।
दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। १ ।।
त्याचे फक्त दर्शन घेतल्यानेच मनातल्या कामना, इच्छा वगैरे पूर्ण होऊन जातात असे संत रामदासांनी म्हंटले आहे. 'दर्शनमात्रे'च्या जोडीला काही भक्त तर 'स्मरणमात्रे'च मनोकामना पूर्ण होतात असेही म्हणतात. पण ही जरा अतीशयोक्ती झाली कारण संपूर्ण समाधान मिळणे हे माणसाच्या स्वभावातच नाही. तो नेहमीच 'ये दिल माँगे मोअर' म्हणत राहतो. शिवाय दोन शत्रूपक्षातल्या किंवा स्पर्धक भक्तांनी एकाच वेळी परस्परविरोधी कामना मनात बाळगल्या तर त्या दोन्ही कशा पूर्ण होणार ?

या आरतीच्या दुस-या कडव्यात राजसी थाटाच्या गजाननाच्या ऐश्वर्याचे साग्रसंगीत वर्णन केले आहे. गणपतीचे पिताश्री शंकर महादेव अंगाला भस्म लावून अगदी साधेपणे रहात असतांना दाखवले जातात, तसेच त्याची आई पार्वतीसुध्दा माहेरच्या ऐश्वर्याचा त्याग करून कसलेही अलंकार न घालता वावरतांना पुराणात दिसते, पण त्यांचा पुत्र गणेश मात्र नेहमी राजसी थाटात असतो.
रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा ।।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।।
हिरे जडीत मुकुट शोभतो बरा ।।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरीया ।।
पार्वतीच्या या पुत्राने रत्नखचित अलंकार परिधान केला आहे, त्याने सर्वांगाला लावलेल्या शेंदुराच्या उटीचा उल्लेख पहिल्या चरणात आलेला आहे, आता त्याच्या जोडीला सुगंधी चंदन आणि लालचुटुक कुंकुमाची भर पडली आहे. त्याच्या पायात रुणुझुणू वाजणा-या नूपुरांच्या (पैंजणांच्या) छोट्या छोट्या घाग-यांपासून ते मस्तकावर धारण केलेल्या हिरेजडित मुकुटापर्यंत हा गणपती सुंदर सजलेला आहे.

लंबोदर पितांबर फणिवर वंधना ।।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।
तिस-या कडव्याच्या पहिल्या दोन ओळींमध्ये गणपतीचे वर्णन असे केले आहे, त्याचे उदर (पोट) मोठे आहे, त्यावर नागाला (पट्ट्यासारखे) बांधले आहे, पिवळ्या रंगाचे धोतर तो नेसला आहे, त्याची सोंड सरळ पण तोंड वाकडे आहे, त्याला तीन डोळे आहेत असे वर्णन या आरतीमध्ये केले आहे, पण गणपतीच्या कुठल्याच चित्रात मी त्याच्या कपाळावर तिसरा डोळा काढलेला पाहिला नाही.  
दास रामाचा वाट पाहे सदना ।।
संकटी पावावे सुरवर वंदना ।।
अशा वर दिलेल्या स्वरूपाच्या गजाननाची वाट रामाचा दास (रामदास) घरी बसून पहात आहे, या देवांनाही वंदनीय अशा देवाने संकटकाळात प्रसन्न व्हावे अशी प्रार्थना संत रामदासांनी केली आहे. (आणि निर्वाणी रक्षावे, या निर्वाणीच्या क्षणी आपले रक्षण करावे, अशी पुस्ती भक्तांनी त्याला जोडून ही विनंती अधित स्पष्ट केली आहे).  काही लोक शेवटची ओळ ''संकष्टी पावावे'' असे म्हणून सगळा अर्थच बदलून टाकतात.

सुखकर्ता दुखहर्ता या आरतीची शब्दरचना अशी अगदी सोपी आहे, त्यात खूप गहन अर्थ भरला असेल असे मला तरी कधी जाणवले नाही. सर्वसाधारण जनतेला ती कळावी, पटावी म्हणजे ते या आरतीचा स्वीकार करतील असाच विचार त्यामागे असावा आणि तसा असल्यास तो कल्पनातीत प्रमाणात साध्य झाला आहे. तीनशेहे वर्षांनंतरही आज अक्षरशः कोट्यावधी लोक गणपतीची ही आरती म्हणतात आणि आज ती देशोदेशी पसरलेल्या मराठी माणसांच्या घरी म्हंटली जात आहे. या आरतीचे आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की गणपती, गणेश, गजानन, विनायक यासारख्या कुठल्याच प्रसिध्द नावाचा समावेश या आरतीच्या कुठल्याही कडव्यात नाही, तरीसुध्दा यातल्या एकंदर वर्णनावरून ही त्याच देवाची आरती आहे यात कोणाला शंका येत नाही.
--------------------------------------------------

या वर्षी परवाच्या शुक्रवार सकाळपर्यंत अलका हॉस्पिटलमधल्या अतिदक्षता विभागात (आय़सीयूमध्ये) झोपून होती. तिची प्रकृती काळजी करण्यासारखी नसली तरी नाजुकच होती. आता या वर्षी गणपती उत्सव कसा साजरा करायचा याची तिला चिंता वाटत होती. पण दोन दिवसात तिच्यात सुधारणा होऊन रविवारी डिस्चार्जही मिळाला. आणि आज गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापनाही करता आली. त्याचीच कृपा.

गणपती बाप्पा मोरया ।

Monday, August 26, 2013

दुनियादारी, टाईम प्लीज आणि गेट् वेल् सून

सुमारे सात आठ वर्षांपासून मी आंतरजालावर (इंटरनेटवर) मराठी अक्षरे वाचायला आणि लिहायला लागलो आहे. या सगळ्या काळात एक ओरड आणि एक रड अधून मधून समोर येत आली आहे. "इंग्रजी आणि हिंदी भाषांकडून होत असलेल्या आक्रमणामुळे मराठी भाषा अधिकाधिक भ्रष्ट होत चालली आहे." अशी ओरड आणि "मराठी भाषा आता लुप्तच होत चालली आहे, तिला कोणी वाली उरला नाही." अशी रड सारखी नजरेसमोर येत राहते. "यात नवे किंवा जगावेगळे असे काही नाही, जगातल्या सगळ्या भाषांमध्ये काळानुसार बदल होतच आले आहेत, मराठी लिहिणा-या आणि वाचणा-यांची संख्या शिक्षणाच्या प्रसारामुळे वाढतच आहे, ग्रामीण लोकांचे बोलणेसुध्दा आता जास्त शुध्द होत आहे." वगैरे संख्यात्मक आणि गुणात्मक मुद्दे मांडून मी माझे विचार अनेक वेळा व्यक्तही केले आहेत. पण गेल्या महिन्याभरात मी दोन मराठी चित्रपट आणि एक मराठी नाटक लागोपाठ पाहिले त्यांची नावे पाहून मलाही थोडे अस्वस्थ वाटले. ती नावे आहेत 'दुनियादारी, टाईम प्लीज आणि गेट् वेल् सून'. त्यांच्या निर्मात्यांना योग्य असे मराठी शब्द का सापडू नयेत? असा प्रश्न पडला. याच अर्थाचे मराठी शब्द वापरायचे असल्यास 'दुनियादारी'ला 'जगरहाटी' असे म्हणता आले असते, पण 'टाईम प्लीज' च्या ऐवजी 'कृपया वेळ' एवढे पुरले नसते. त्याच्यापुढे 'दे, घे, द्या, घ्या' असे काहीतरी यायला हवेच आणि हे कोणी कोणाला म्हणायचे या प्रश्नाभोवती तर त्या सिनेमाचे कथानक फिरते. 'गेट् वेल् सून' याचेसुध्दा "लवकर बरा हो, बरी हो, बरे व्हा, ब-या व्हा" वगैरे अर्थ काढता येतात आणि त्यातला कोठला अर्थ काढायचा हे या नाटकातले रहस्य आहे. शिवाय यातले कोठलेही पर्याय सिनेमा किंवा नाटकाचे शीर्षक म्हणून आकर्षक वाटत नाहीत. मी तरी असल्या शीर्षकाचे नाटक वा सिनेमा पहायला बहुधा कधी गेलो नसतो. त्यापेक्षा इंग्लिश नावच प्रेक्षकांना आकर्षक वाटेल यात शंका नाही. अखेर प्रेक्षकांनी यावे हाच तर या नाटक सिनेमाच्या निर्मितीच्या प्रपंचामागे असलेला मुख्य उद्देश असतो ना!

दुनियादारी हा चित्रपट एका प्रसिध्द कादंबरीवरून काढला असला तरी मी काही ती कादंबरी वाचलेली नाही. त्यामुळे थेटरात जातांना माझी पाटी कोरीच होती. सुरुवातीलाच सई ताम्हणकरला चांगली वयस्क दाखवली आहे आणि माझी समजूत चुकली नसेल तर ती तिच्या नातीला पूर्वीच्या काळातली गोष्ट सांगते आहे असे दाखवून फ्लॅशबॅकमध्ये मुख्य कथानक सुरू होते. तसे असेल तर सुरुवातीच्या सीनमधली सई (तिचे पात्र) सुमारे माझ्या वयाची असावी आणि या सिनेमातल्या कथानकाचा काळ मी पुण्यात कॉलेज शिकत असतांनाचा असायला हवा. त्या काळातसुध्दा एस पी कॉलेज, अलका टॉकीज आणि ससून हॉस्पिटल होते, पण त्या ठिकाणांमधले वातावरण, रस्त्यातली रहदारी, माणसांचे कपडे, बोलणे. चालणे वगैरेतले काहीच मला ओळखीचे वाटले नाही. या कादंबरीची कथा कालातीत आहे, त्यामुळे तिचा विशिष्ट 'पीरीयड' मुद्दाम दाखवण्याची गरज नाही असे म्हणता येईल. पण तसेच करायचे असेल तर सुरुवातीचा आणि शेवटचा सीन कापून टाकायलाही काही हरकत नव्हती. त्या दोन्ही सीन्समध्ये सिनेमाच्या गोष्टीवर काही परिणाम होईल असे काहीच घडत नाही. शेवटच्या सीनमध्ये सगळ्या पात्रांच्या चेहे-यावर सुरकुत्या रंगवायचा आणि त्यांच्या केसात चंदेरी छटा दाखवायचा मेकअपमनचा त्रास तरी वाचला असता.

अंकुश चौधरी आणि जितेंद्ग जोशी हे दोघेही गुंड मवाली असले तरी त्यातला अंकुश हा नीच नाही असे तो स्वतःच एका प्रसंगात सांगतो आणि तसे वागतो.  चुलबुल पांडे सारखे दबंग डीएसपीचे (नावापुरता) पात्र त्याने टेचात रंगवले आहे. जितेंद्र मात्र गुंडही आहे आणि नीचही आहे असे दाखवले असले तरी तो मला तरी तसा दिसला नाही. टीव्हीवर त्याला अनेक वेळा 'इनोदी' काम करतांना पाहिलेले असल्यामुळे त्याच्या चेहे-यावर बसलेली ती छाप काही केल्या जात नाही. उलट त्याला असा निगेटिव्ह रोल देणे हाच मला एक विनोद वाटला. सिनेमाच्या तिकीटांचा काळाबाजार आणि दारूचे गुत्ते वगैरे उद्योग करणा-या त्यांच्या टोळक्यातल्या मुलांना (खरे तर बाप्यांना) कॉलेजात नावे घालण्याची काय गरज पडली तेच जाणोत. त्यांचे गँगवॉर खेळायला त्यांना पुण्यात आणखी कुठे जागा नव्हत्या का? मी कॉलेजात शिकत असतांना तरी पुण्यातल्या कॉलेजांचे असे स्वरूप पाहिले किंवा ऐकले नव्हते. आता तसे झाले असले तर ते भयंकर आहे.

निरागस आणि गोड चेहेरा असलेला स्वप्निल जोशी लहानगा कृष्ण म्हणून टीव्हीवर आला तेंव्हा जबरदस्त लोकप्रिय, अगदी सुपरहिट, झाला होता. त्यानंतरही मी त्याला बहुतेक वेळा चॉकलेट हीरोच्या रूपातच पाहिला आहे. दुनियादारीमध्ये त्याला थोडा वेगळा आणि थोडा त्याच्या प्रतिमेला साजेसा असा रोल मिळाला आहे. यात केवळ मैत्रीखातर तोसुध्दा एका गँगमध्ये सामील होतो, पण गँगस्टर लोकांना सद्बुध्दी देण्यासाठी प्रयत्न करत राहतो. "यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी।.. ये दोसती हम नही छोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे।... यारबिना चैन कहाँ रे।." वगैरे गाण्यांना साजेल असे तो बोलत आणि वागत असतो. "तेरी मेरी पक्की यारी आणि xxमध्ये गेली दुनियादारी" अशा प्रकारचे एक पालुपद नेहमी म्हणत असतो. पण त्याच्या अंतर्मनात एक उदात्त, महान वगैरे आत्मा नेहमीच वास करत असतो. स्वप्निलने हे दुहेरी पात्र मोठ्या ताकदीने उभे केले आहे.

सई ताम्हणकर हे एक अजब पात्र या सिनेमात आहे. ती काही डॉक्टरसारखी दिसत नाही असे सिनेमातलेच एक कॅरॅक्टर एकदा सांगते, पण काही प्रसंगांमध्ये ती डॉक्टरसारखी दिसते आणि तसे वागतेसुध्दा. एरवी ती अगदी चंट बनून बिनधासपणे वावरत असते, पण चार लोकांसारखे आपण सुखाने जगायचे नाहीच असे तिने मनाशी ठरवले असावे. कथेतल्या एका व्यक्तीसाठी ती एवढा मोठा त्याग का करते आहे असा प्रश्न पडतो किंवा तो तिचा  मूर्खपणा वाटतो, आणि दुस-या व्यक्तीसाठी मोठा त्याग केल्यामुळे ती एकदम महान वाटायला लागते. कथेनुसार हे तिचे निरनिराळ्या प्रकारे दिसणे, न दिसणे आणि वागणे वगैरे तिने अप्रतिम साधले आहे. ऊर्मिला कानेटकरने केलेला  सुंदर अभिनय अपेक्षित होता. इतर पात्रांनीही आपापली कामे ठीक केली आहेत.

'दुनियादारी' या शब्दाचा अर्थ 'जगरहाटी', 'जनरीत' वगैरे असावा असे मी समजत होतो. घरी आल्यावर मी हिंदी शब्दकोश उघडून त्याची खात्रीही करून घेतली. पण 'आपले हित सोडून विनाकारण दुस-याच्या फंदात पडणे' असा काहीसा या शब्दाचा अर्थ या चित्रपटात ध्वनित होतो. तो अर्थ जो काही असेल तोसुध्दा फक्त xxमध्ये जाण्यापुरताच आहे. त्याव्यतिरिक्त मला तरी या गोष्टीत कुठेच सर्वसामान्य जगरहाटी दिसली नाही. कदाचित माझ्या माहितीतले जगच वेगळे आहे की काय असे वाटायला वागले. असे सगळे असले तरी हा चित्रपट पाहतांना आपण त्यात गुंतत जातो, कोणता माणूस कुठे आणि कोणत्या रूपात अचानक समोर येईल ते सांगतां येत नाही, त्यामुळे आपल्याला आश्चर्याचे धक्के बसतात, पुढे काय होणार याची उत्कंठा वाटते. हंसू येते, डोळ्यात पाणी येते, पण केंव्हाच जांभया येत नाहीत.  त्यामुळे थेटरामधून बाहेर येतांना पैसे वसूल झाल्यासारखे वाटते. सामान्य प्रेक्षकाला याहून आणखी काय हवे?

टाईम प्लीज या सिनेमात प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तुफान लोकप्रिय झालेल्या एका मालिकेमध्ये या दोघांनी एकत्र काम केले होते तेंव्हाच ते त्यांच्या जीवनातसुध्दा एकत्र येणार असल्याच्या बातम्या, वावड्या, अफवा उठल्या होत्या. त्यानंतरसुध्दा त्यांनी काही सिनेमे किंवा मालिकांमध्ये जोडीने काम केले असेल. या क्षेत्रातली माझी माहिती फारच तोकडी आहे. पण ती मालिका बंद होऊन बराच काळ लोटून गेल्यावर त्यांच्या लग्नाची बातमी आली. अर्थातच त्यांनी त्यासाठी बराच 'वेळ' (टाईम) दिला घेतला असणार. पण 'टाईम प्लीज' या चित्रपटात मात्र सुरुवातीलाच एका रेस्तराँमध्ये त्यांच्या पहाण्याचा कार्यक्रम होतो. "काहीच का बोलत नाहीस?", "काय बोलू?", "अशा वेळी काय बोलायचं असतं?" अशा प्रकारच्या दोन चार संवादात ती मुलाखत आटोपून लगेच त्यांचे शुभमंगल झाल्याचे दाखवले आहे आणि उमेशच्या घरात प्रिया रहायला येते. उमेश एका सॉफ्टवेअर कंपनीत मोठ्या हुद्द्यावर पोचून प्रतिष्ठित माणूस झालेला असतो, तर प्रिया वयाने वाढली असली तरी मनाने अजून शरतबाबूंची अल्लड 'बालिका बोधू'च राहिलेली असते. तिच्या निरागस वाटणा-या स्वच्छंदी वागण्याने आणि त्यात घडोघडी चुका करत राहण्याने आधी त्यामुळे होणारा त्रास भोगून सुध्दा उमेशचेही मनोरंजन होते. पण प्रियाचा बालमित्र सिध्दार्थ जाधव त्यांच्या घरी अचानक अवतीर्ण होतो आणि तिथेच ठिय्या मारून राहतो. त्यानंतर चित्र बदलते.

लहान मुले जशी एकमेकांशी वागतात तसेच प्रिया सिध्दूसोबत थिल्लरपणे नाचत बागडत असते, पण उमेशला ते आवडत नाही म्हणण्यापेक्षा सहन होत नाही, त्या दोघाच्याबद्दल उमेशच्या मनात संशय निर्माण होतो. याच काळात उमेशची भूतकाळातली प्रेयसी सई योगायोगाने त्याच्याच ऑफीसात कामाला लागते. मित्रत्वाच्या नात्याने आणि तिला नव्या जागी रुळण्यासाठी मदत व्हावी म्हणून उमेश तिला साथ देतो, तिला आपल्या ग्रुपमध्ये सामावून घेतो आणि कंपनीने एक अर्जंट काम त्यांना करायला दिले असल्यामुळे ते करण्यासाठी तिला रात्री अपरात्री घरीसुध्दा घेऊन येतो. आतापर्यंत मनाने लहान असलेली प्रिया आता या बाबतीत मोठी होते आणि असूयेच्या भावनेने पेटते. अशा त-हेने दोन्ही बाजूंनी संशयकल्लेळ सुरू होतो आणि वाढत जातो. त्यातच नको त्या वेळी, नको त्या ठिकाणी, नको ती माणसे अचानक दृष्टीला पडल्यामुळे गैरसमजुती होतात आणि गुंता वाढत जातो. चार दिवस दोघांनी एकमेकांपासून दूर रहावे आणि आपल्या नातेसंबंधाबद्दल शांतपणे विचार करून काय ते ठरवावे अशी 'टाईम प्लीज' सूचना उमेश करतो आणि प्रियाला तिच्या माहेरी पोचवून येतो. तिथे तिची आई आणखी एक गौप्यस्फोट करते. मनाशी काहीतरी ठरवून प्रिया घरी परत येते आणि आणखी एका गैरसमजाला बळी पडून परत जाते. तिचा फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड सिध्दूच त्याच्या भात्यामधून आणखी एक अस्त्र बाहेर काढतो आणि संशयपिशाच्च्याचे दमन करतो. अशा प्रकारे उमेश आणि प्रियाची लग्नानंतरची प्रेमकहाणी सफळ संपूर्ण होते.

उमेश आणि प्रिया यांनी सिनेमातल्या नायक नायिकांच्या भूमिका चांगल्या वठवल्या आहेत, पण सहकलाकार असलेला सिध्दार्थ जाधवच त्यांना झाकाळून टाकतो. थेटरमधले बहुतेक प्रेक्षक त्याच्या प्रत्येक वाक्याला आणि कृतीला उत्स्फूर्तपणे दाद देत असतात, ते बहुधा त्यालाच पहायला थेटरात आले आहेत असे वाटते. मला ते पात्र थोडे गरजेपेक्षा जास्त भडक आणि उथळ वाटले, पण ते प्रभावीपणे सादर करणा-या सिध्दार्थचे कौतुकही वाटले. या चित्रपटातले सईचे पात्रसुध्दा बरेच गुंतागुंतीचे आहे आणि त्यातल्या विविध छटा तिच्या अभिनयात तिने उत्तम प्रकारे आणल्या आहेत. अभिनयाचे इतके चांगले अंग असतांना तिने तिची भूमिका वठवण्यासाठी उगाच वेगळे कपडे घालण्याची आणि भसाभसा सिगारेटी फुंकत बसण्याची गरज नव्हती. या सिनेमातल्याच एका जोडप्याचा संसार आयुष्यभर वेळ देऊनसुध्दा धड चालत नाही आणि दुसरा त्याआधीच सहनशक्तीचा अगदी अंत पाहून अखेर मोडला असतो, असे असले तरीही. 'लग्न ठरवणे किंवा ते मोडणे यासारखे महत्वाचे निर्णय घाईघाईत घेऊ नयेत, त्यापूर्वी जोडीदाराला थोडा वेळ द्यावा, स्वतः थोडा वेळ घ्यावा.' असा संदेश या चित्रपटात दिला आहे. या चित्रपटाची मांडणी, त्यातले लहान लहान प्रसंग, संवाद, मुख्य पात्रांचा अभिनय, भावपूर्ण शेवट वगैरे सगळे मिळून एक चांगली भट्टी जमली आहे.        

'गेट वेल सून' हे एक चाकोरीबाहेरचे नाटक आहे. यात सेटच्या एका भागात आनंद या मानसोपचारतज्ज्ञाचा दवाखाना थाटला आहे, म्हणजे भिंतीवर काही चित्रे, एक टेबल, दोन चार खुर्च्या, एक कपाट वगैरेंधून तसा आभास निर्माण केला आहे आणि स्टेजच्या उरलेल्या भागात निरनिराळे सेट मांडून कथेमधले इतर प्रसंग दाखवले जातात. एक महिला पत्रकार डॉक्टरांची मुलाखत घेत असतात आणि मनोरुग्णांचे प्रकार, त्यातले व्यसनाधीन लोक, त्यांचे प्रकार, त्यांच्या व्यसनात अडकण्यातल्या आणि त्यातून बाहेर पडण्यातल्या स्टेजेस वगैरेंची वैद्यकीय माहिती डॉक्टरसाहेब त्या रिपोर्टरला देत असतात. या विषयावरील एक उद्बोधक डॉक्युमेंटरी आपण पहात आहोत असेच बरेच वेळा वाटते. हे सांगत असतांना डॉक्टर एका गोंडस सैतानाचा (लव्हेबल रास्कलचा) उल्लेख करतात आणि त्याची गोष्ट फ्लॅशबॅकमधून सुरू होते. पण दुनियादारी सिनेमाप्रमाणे आपल्याला ती भूतकाळात घेऊन जात नाही. दोन तीन वाक्यांचे छोटे छोटे तुकडे डॉक्टर सांगत आहेत अशा पध्दतीने ती कथा हळूहळू उलगडत जाते. त्या गोष्टीतसुध्दा एका व्यसनाधीन माणसाचे वागणे, त्याने व्यसनमुक्त होण्यासाठी प्रयत्न करण्याला आधी विरोध करणे, डॉक्टरांनी त्यांच्या संभाषणकौशल्याने त्याचे मन वळवणे वगैरे पहात असतांना ती मुक्तांगण किंवा अल्कोहोलिक अॅनॉनिमसवरची डॉक्युमेंटरी वाटते. पण स्वप्निल जोशीचा सुरेख अभिनय आणि चटपटीत संवादांमधून ती मनोरंजक बनवली आहे. मध्यंतराच्या वेळेस अचानक एक घटना घडते आणि ती महिला पत्रकार स्वतःच त्या कथेचा भाग बनते. व्यसनमुक्त झालेला स्वप्निल पुन्हा त्यात परत जाणार की काय अशी आशंका निर्माण होते. पण अखेर सगळे काही आलबेल होते, कोणी व्यसनमुक्त होतात आणि कोणी त्या मार्गाला लागतात.

या नाटतात डॉक्टर, स्वप्निल आणि महिला पत्रकार एवढी तीनच मुख्य पात्रे आहेत. स्वप्निलची पत्नी अधून मधून दिसते आणि डॉक्टरांकडे एक असिस्टंट आहे एवढे दाखवण्यापुरती येजा ती करत असते. डॉक्टरची भूमिका करणारे संदीप मेहता आणि पत्रकार सुमेधा गुरू यांनी आपापल्या भूमिका उत्कृष्ट वठवल्या आहेत. स्वप्निल जोशीचे रंगभूमीवरचे हे पहिलेच नाटक आहे. यापूर्वी मी त्याला सिनेमा आणि टीव्हीवरच पाहिले आहे. पण त्याने या नाटकातली लव्हेबल रास्कल प्रतीकची अवघड भूमिका अप्रतिम उठवली आहे. व्यसनी पण सुसंस्कृत माणसाच्या मनात चालत असलेले अंतर्द्वंद्व त्याने कुशलतेने दाखवले आहे. या सगळ्यांचे श्रेय रंगमंचावरील कलाकांरांइतकेच किंबहुना कणभर जास्तच या नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना द्यावेसे वाटते. डॉ.आनंद नाडकर्णी या नावाजलेल्या नामसोपचारतज्ज्ञाने लिहिलेल्या कादंबरीवरून प्रशांत दळवी यांनी लिहिलेल्या या नाटकातले संवाद त्यांनी खूपच अभ्यासपूर्ण लिहिले आहेत. त्यांनी लिहिलेल्या संवादामधून त्यांनी कुठेही कंटाळवाणी न वाटता पण खूप उद्बोधक माहिती दिली आहे आणि त्याबरोबरच या नाटकाच्या कथेचा ओघही मनोरंजकपणे पुढे नेला आहे. त्यात थोडा रहस्यमय़ भाग आणला आहे. व्यसनग्रस्त माणसाची बदलती मनस्थिती, त्याच्या आप्तांची तळमळ, समाजाला व्यसनमुक्त करण्याचे कंकण हाती बांधलेल्या डॉक्टरांनी वेळोवेळी येणा-या अपयशाने निराश न होता होईल तितके करण्याचा गेतलेला ध्यास हे सगळे दळवींनी संवादामधून अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. आवर्जून पहावे आणि इतरांना पहायला सांगावे असे वाटणारे हे नाटक आहे.   

सिनेमा किंवा नाटकाची गोष्ट आणि विशेषतः तिचा शेवट न सांगता त्यावर शेरेबाजी करीत  लिहिणे कठीण आहे, पण एका वाचकाने केलेल्या प्रेमळ सूचनावजा मागणीमुळे प्रेरणा घेऊन मी तसा एक लहानसा प्रयत्न मी करून पाहिला आहे.

Friday, August 23, 2013

होडी ते पाणबुडी आणि ..... मी


'नदीपार जाण्यासाठी आणि नद्यांच्या तीरावर असलेल्या गावांमध्ये जाण्यायेण्यासाठी पूर्वापारपासून लहान होड्यांचा उपयोग होत आला आहे. भारतातल्या बहुतेक सर्व मोठ्या नद्यांवरसुध्दा आता जागोजागी पूल बांधले गेले आहेत आणि खेडोपाडी जाणारे रस्ते झाले आहेत. माझ्या लहानपणी तसे नव्हते. जमखंडी गावातल्या आमच्या राहत्या घरापासून आमचे वडिलोपार्जित घर आणि शेतजमीन असलेल्या मूळ खेडेगावापर्यंतचे अंतर फक्त वीस किलोमीटर होते, पण घरातून निघून तिकडे जाऊन पोचण्यासाठी एक पूर्ण दिवस लागत असे, कारण दोन्ही गावांच्यामध्ये कृष्णा नदीचा प्रवाह होता आणि तिच्या दोन्ही बाजूंना पक्के रस्तेही नव्हते. जिथपर्यंत रस्ता जात होता तिथपर्यंत बसमधून गेल्यानंतर पुढे चालत जाऊन नदी पार करून पलीकडे जायचे आणि पुन्हा थोडे अंतर चालत जाऊन पुढे जाण्यासाठी दुसरी बस मिळेल तेंव्हा पकडायची असे सोपस्कार करावे लागत.

कृष्णामाईच्या तीरावर गेल्यानंतर तिथेसुध्दा नावेची वाट पहात बसावे लागत असे. घरून आणलेले डबे तिथल्या रम्य जागी उघडून आणि केळी, पेरू वगैरे त्याबरोबर खाऊन आम्ही पिकनिकचा आनंद घेत असू. त्यातही पावसाळ्यात जेंव्हा नदीला महापूर येई तेंव्हा तिला येऊन मिळणा-या ओढ्यानाल्यांमध्ये नदीचे पाणी शिरून त्यांचे रूपांतर दोन तीन उपनद्यांमध्ये होत असे आणि एरवी नावेत चढण्या व उतरण्यासाठी ठरवलेल्या जागा पाण्याखाली जाऊन अदृष्य होत असत. प्रचंड वेगाने खळखळाट करत जात असलेल्या पाण्याच्या रौद्र रूपाच्या त्या प्रवाहात नाव चालवण्याचे धाडस कुणी करत नसे आणि कोणा धीट माणसाने ते केलेच तरी त्याला उतारू मिळणे अशक्य असल्यामुळे तिथली (आताच्या भाषेतली) 'फेरी सर्व्हिस' पावसाळ्यात बंद रहात असे. त्या नदीनाल्यांना नावेमधून पार करून पलीकडे जाणे तेवढ्या काळात शक्यच नव्हते. पलीकडचे लोक पलीकडे आणि अलीकडचे लोक अलीकडे रहायचे. उगारला असलेला रेल्वेचा पूल तेवढा बारा महिने पाण्याच्या वर असे. त्यामुळे फारच निकडीची गरज असल्यास दीडदोनशे किलोमीटरचा वळसा घालून उगार शेडबाळ अथणीमार्गे जावे लागत असे. पण इतर दिवसात मात्र आम्ही नावेत बसून मजेत कृष्णा नदी पार करत असू.

ती नाव सुमारे आठदहा मीटर लांब आणि मधोमध तीन चार मीटर रुंद एवढी मोठी असायची. माणसे, त्यांची गाठोडी, सायकली आणि कोंबड्या वगैरे त्यात जितके भरता येतील तेवढे भरून त्यांना नावेमधून पलीकडे नेले जात असे. पहिल्या फेरीत न मावल्यामुळे उरलेले लोक नावेला पलीकडच्या तीरावर जाऊन परत येण्याची शांतपणे वाट पहात बसत. क्वचित प्रसंगी एक एक करून त्यावरून बैलगाड्यासुध्दा पलीकडे जाऊ शकत. कारवारजवळील एका ठिकाणी तर एस.टी.च्या बसलासुध्दा मोठ्या नावेमधून नदीच्या पार नेतांना मी पाहिले आहे. मात्र सावधगिरीचा उपाय म्हणून आणि नावेचा समतोल राखण्यासाठी माणसांना खाली उतरवून त्यांना आणि गाड्यांना वेगवेगळ्या फे-यांमध्ये नावेतून नेले जात असे. बैलांनी नावेवर दंगा गोंधळ करू नये म्हणून त्यांना मात्र नावेच्या बाजूने पाण्यामधून पोहवत पलीकडे नेत असत. गायी म्हशींनासुध्दा लांब दोरीने बांधून नावेच्या सोबत पाण्यामधून पोहत नेत असत.

नदीच्या पात्रामधील पाण्याच्या खोलीचा अंदाज घेऊन नावेत चढण्या उतरण्यासाठी जागा ठरलेल्या होत्या. पण तिथे पक्के बांधकाम केलेले धक्के नव्हते. ती नाव नदीकिना-यापासून दूर कंबरभर पाण्यात उभी रहात असे आणि माणसांनी आपले सामान डोक्यावर धरून पाण्यामधूनच तिथपर्यंत चालत जाऊन नावेत चढायचे असे. कोणी ना कोणी धडधाकट उतारू  लहान मुलांना उचलून नेत असे. नावेच्या कडांवर दोन्ही बाजूंना मोठमोठी वल्ही बसवलेली असत आणि बलदंड नावाडी "हुश्शा हुय्या" करत जोर लावून ती चालवत. उन्हाळ्यात नदीचे पाणी फारच कमी असले तर पलीकडे जाण्यासाठी एक लहान नाव असायची आणि लांब बांबूच्या सहाय्याने नदीच्या तळाला रेटा देऊन नावेला ढकलतच पार करत असत. अशा प्रकारचा नावेमधला प्रवास मी लहान असतांना अनेक वेळा केला असल्यामुळे माणसांच्या हातांच्या जोराने चालवलेली होडी माझ्या ओळखीची झाली होती.

पुण्याच्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये तर आमचाच बोटक्लब होता. संध्याकाळी कॉलेज सुटल्यानंतर केंव्हाही वाटले की एकाद दोन मित्रांसोबत आम्ही तिकडे जात होतो आणि स्वत-च होडी चालवून तिथल्या शांत पाण्यावर तरंगत राहण्याची मजा घेत होतो. यात मजेबरोबर चांगला व्यायामही होत असल्याने चांगली सडकून भूक लागत असे आणि मेसमधले जेवण अमृततुल्य वाटत असे. पुढे मुंबईला आल्यावर गेटवे ऑफ इंडियाच्या जवळून चालणा-या मोटरलाँचमध्ये बसून वेळ असल्यास घारापुरी (एलेफंटा) बेटापर्यंत आणि नसेल तर आजूबाजूच्या समुद्रात फेरफटका मारून आणणे हा मुंबईदर्शनाचा आवश्यक भाग झाला होता. आमच्याकडे येऊन गेलेल्या बहुतेक सगळ्या पाहुण्यांना आम्ही हा जलविहार घडवून आणलाच, शिवाय मित्र, सहकारी, शेजारी वगैरेंच्या निरनिराळ्या ग्रुपमधून घारापुरी बेटाची सहलही केली.

एकदा सात आठ मित्रांचे आमचे टोळके एलेफंटाहुन परत येत असतांना आमच्याच लाँचमध्ये थोड्या अंतरावर आठ दहा समवयस्क मुलींचा एक वेगळा ग्रुप बसला होता. वेळ घालवण्यासाठी आम्ही गाणी म्हणायचे ठरवले, आमच्या ग्रुपमधल्या एक दोन मुलांचे आवाज चांगले होते, त्यांना आवडही होती आणि अनेक गाणी तोंडपाठ होती. त्यांनी गाणी म्हणणे हा आमच्या मेळाव्यांमधला नेहमीचाच भाग होता. पण आम्ही जसे ठरवले तसेच त्या मुलींनीही गाणी गायचे ठरवले. सर्वात आधी याची सुरुवात कुणी केली ते सांगता येणार नाही. सुरुवातीला एकेक जणच आपापल्या कंपूसाठी गाणे म्हणत होता किंवा होती, पण दोन्ही ग्रुपमधल्यांना एकमेकांची गाणी ऐकू येतच होती. त्यामुळे आपला आवाज मोठा करण्यासाठी त्यात इतरांनी साथ द्यायला सुरुवात केली, त्यातून मग एक प्रकारची चढाओढ सुरू झाली, गाण्यांमधूनच सवालजवाब, उत्तरेप्रत्युत्तरे होत गेली. अतीशय सभ्य आणि सुसंस्कृत स्वरूपाचा आमचा हा धिंगाणा आमची लाँच गेटवेच्या धक्क्याला लागेपर्यंत चालला. तो इतका रंगत गेला की एरवी कधी गाण्यासाठी तोंडही न उघडणारे मित्रसुध्दा शेवटी शेवटी बेंबीच्या देठापासून किंचाळायला लागले होते. इतर प्रवाशांची त्यामुळे चांगली करमणूक झाली असेल. उतरल्यानंतर आम्ही दुरून हात हालवूनच मुलींच्या टोळीचा निरोप घेतला आणि त्यांनीही गोड हंसून दिला. त्या कोण होत्या, कुठून आल्या होत्या कोण जाणे, पण नावेमधल्या त्या लहानशा प्रवासाची एक अविस्मरणीय अशी सुखद आठवण मनात ठेऊन गेल्या.

आम्ही प्रत्यक्षात काश्मीरला जाण्यापूर्वी हिंदी सिनेमांमधून जेवढे काश्मीर पाहिले होते त्यात नौकाविहार आणि बर्फामधून घसरत जाणे हेच लक्षात राहिले होते. आम्ही स्वतः श्रीनगरला गेलो तेंव्हा दोन प्रवाशांना सरोवरात विहार करवून आणणारी छोटीशी नाव पाहिली, तिच्यात बसून फिरून आलो आणि राहण्याच्या सर्व सुखसोयींनी सज्ज असलेली हाउसबोटही पाहिली. दल सरोवरातून फेरफटका मारत असतांना तिथे नावांमधून फुले, फळे, भाज्या, शोभेच्या वस्तू वगैरे गोष्टी होडीत बसूनच विकणारे फिरते विक्रेते असलेला बाजारसुध्दा पाहिला. चिनाब नदीवर एक बंधारा घालून दल सरोवर निर्माण केले आहे आणि त्यातले पाणी वाहून जाऊ नये यासाठी ते नियंत्रित स्वरूपात नदीत सोडले जाते. बहुतेक सगळ्या नावा मात्र नदीच्या खालच्या अंगाला ठेवलेल्या असतात. नदीचे पात्र आणि सरोवर या दोन्हींच्या मध्ये एक लहानसे कुंड आहे. त्याला दोन्ही बाजूंना घट्ट बसणारे दरवाजे आहेत. नदीमधून सरोवरात जायचे असल्यास आधी बाहेरचा दरवाजा वर उचलून नावांना त्या कुंडात घेतात आणि तो दरवाजा घट्ट बंद करतात. सरोवरातले पाणी तिथे सोडून तिथल्या पाण्याची पातळी वाढवतात. ती सरोवराइतकी झाल्यानंतर आतल्या बाजूचे गेट उघडून त्या नावांना सरोवरात जाऊ देतात. बाहेर येतांना याच्या उलट क्रमाने कृती करतात. असे करून सरोवर आणि नदीचे पात्र यातल्या पाण्याच्या लेव्हल्स वेगवेगळ्या ठेवल्या जातात. पण यामुळे नौकाविहार करणा-या पर्यटकांना आत जातांना तसेच बाहेर येतांना बराच वेळ लहानशा जागेत ताटकळत थांबावे लागते.

जबलपूरजवळ असलेला भेडाघाटचा धबधबा आणि तिथून दोन तीन किलोमीटरपर्यंत असलेला नर्मदा नदीचा प्रवाह खूप प्रेक्षणीय आहे. या भागातला डोंगरच संगमरवरी दगडांचा आहे. नर्मदेच्या त्या भागातल्या प्रवाहातून नावेत बसून विहार करण्याची चांगली सोय आहे. नदीचे पात्र खूप रुंद नसले तरी ब-यापैकी आहे, अत्यंत निर्मळ आणि पारदर्शक असे पाणी आणि दोन्ही बाजूला संगमरवरी पहाडांच्या उंच कड्यांची शोभा पहात त्या बोटीमधून जातांना खूप मजा येते. माझ्या कुटुंबीयांसोबत तर मी अनेक वेळा ही मौज लुटलेली आहेच, एकदा एका सेमिनारसाठी जबलपूरला गेलो असतांना तिथे आलेल्या फॉरीन पार्टिसिपेंट्सच्यासोबतही हे भ्रमण करायचा योग आला होता. त्या मोटर लाँचेसचे नावाडी अत्यंत गंमतशीर असी कॉमेंटरी हिंदी भाषेत करतात. त्या दिवशी सुध्दा त्यातल्या कोणाला इंग्रजीत बोलता येत नव्हते. त्यामुळे मलाच दुभाषा बनून त्यांनी सांगितलेल्या गमतीजमतींचे जमेल तेवढे भाषांतर करून सांगावे लागले होते. शिवाय भारतीय परंपरांबद्दल माहिती देऊन त्याचा अर्थ थोडा समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा लागत होता.

आम्ही केलेल्या युरोप आणि अमेरिकेच्या सहलींमध्येसुध्दा क्रूज हा एक महत्वाचा भाग असायचा. त्यात आधुनिक पध्दतीच्या आलीशान बोटी पहायला मिळाल्या. थेम्स नदीतून जातांना दोन्ही बाजूंना दिसणारे जुने आणि नवे लंडन आणि सीन नदीमधून नावेतून फिरतांना पॅरिसमधल्या ऐतिहासिक आणि आधुनिक इमारती बाहेरून पाहिल्या. पाण्यातच उभारलेला व्हेनिस शहराचा जुना भाग दोनचार शतकांपूर्वी जसा होता तसाच अद्याप ठेवला आहे. या भागात रस्ते नाहीतच, सगळी घरे कालव्यांनी जोडलेली आणि सगळीकडे होडीमधूनच फिरायचे. आम्हीसुध्दा जुन्या वाटणा-या पण मोटरवर चालणा-या एका लहानशा नावेत बसून व्हेनिसच्या अरुंद गल्लीबोळामधून भटकंती करून घेतली, पण सिनेमात किंवा फोटोत दिसतो तसा तो भाग प्रत्यक्षात प्रेक्षणीय तर वाटला नाहीच, उलट दुर्गंधाने भरलेला, गलिच्छ आणि किळसवाणा वाटला. पर्यटन करतांना काही जागी अशी निराशा होत असते. अॅमस्टरडॅम हे शहरसुध्दा खाड्या आणि कालवे यांनी भरलेले आहे. तिथली बोटराईड मात्र छान होती. हॉलंड या देशाचा बराचसा भाग समुद्रसपाटीच्या खाली आहे. समुद्राला जेंव्हा भरती येते तेंव्हा तिथल्या नद्या, खाड्या वगैरे जिथे समुद्राला मिळतात त्या ठिकाणी त्यांच्या पाण्याची पातळी समुद्रापेक्षा खाली असते. त्या वेळी त्यात समुद्राचे पाणी उलट दिशेने शिरू नये म्हणून बंधारे, गेट्स आणि झडपा वगैरेंची बरीच गुंतागुंतीची व्यवस्था केलेली आहे. श्रीनगरच्या दल लेकमध्ये नावांना आत शिरण्याची आणि बाहेर पडण्याची जशी योजना आहे त्याच प्रकारची पण खूप मोठ्या प्रमाणावर केलेली योजना अॅमस्टरडॅम बंदरात मोठमोठ्या जहाजांसाठी कार्यरत आहे.  

सिंदबादपासून ते कोलंबस, वास्कोडिगामा करत करत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधीजींपर्यंत अनेकांनी केलेल्या समुद्रातल्या प्रवासाची वर्णने मी लहानपणी खूप चवीने वाचत असे. "हा सुवेझ कालवा, थक्क करील मानवा।।" यासारख्या कविताही शाळेतल्या पुस्तकांमध्ये होत्या. आपणही एकदा मोठ्या जहाजामधून प्रवास करून पाहण्याची सुप्त इच्छा त्या वर्णनांमधून मनात येत होती. पण ती काही पूर्ण झाली नाही. मला परदेशी जाण्याची संधी मिळेपर्यंत तो प्रवास विमानानेच करायचा हे रूढ झालेले होते, प्रवासात अनेक दिवस घालवण्याची तयारी आणि इच्छा कोणाच्या मनात असली तरी तशी सोयच तोपर्यंत बंद झाली होती. पुढे माझे काही मित्र आणि आप्त आगबोटीने जाऊन अंदमानची सहल करून आले, पण या बाबतीतही मला जरा उशीरच झाला.      

दर वर्षी डिसेंबर महिन्यात नौदल दिन साजरा करतात. त्या दिवशी मुंबई बंदरातली एक युध्दनौका आम जनतेला पाहण्यासाठी खुली परवानगी दिलेली असते. याविषयी अनेक वेळा ऐकल्यामुळे एका वर्षी आम्ही ती नाव पहायला गेलो. ती पहायला त्या दिवशी आलेल्या लोकांची जवळ जवळ गेट वे ऑफ इंडियापर्यंत लांब रांग लागली होती, पण ती हळू हळू पुढे सरकत होती हे पाहून आम्ही रांगेत जाऊन उभे राहिलो. हळू हळू पुढे सरकत तासाभरात लायन गेटपर्यंत जाऊन पोचलो. आत गेल्यानंतर पुन्हा तितकीच लांब रांग डॉकच्या आतमध्ये होती. ते चालत चालत जाऊन आणखी एक तासानंतर आम्ही एका फ्रिगेटवर चढलो. तिथला फक्त डेकच लोकांना पहाण्यासाठी खुला ठेवला होता. त्यावर एक दोन तोफा बसवलेल्या होत्या. बाकीची केबिन्स आणि इतर सर्व जागा कड्याकुलुपांमध्ये बंद होत्या. इतर प्रेक्षकांना कदाचित त्यात रस नसेल, पण माझ्यातला मेकॅनिकल इंजिनियर जागा असल्यामुळे मला तिथली यंत्रसामुग्री पहाण्याची खूप इच्छा होती. ती पूर्ण होऊ शकली नाही. पाच मिनिटात त्या युध्दनौकेच्या रिकाम्या आणि सपाट डेकवर एक प्रदक्षिणा घालून आम्हाला खाली उतरावे लागले. तिरुपतीच्या व्यंकटेशाचे किंवा पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी तासन तास रांगेत उभे रहावे आणि ते घेतल्यानंतर एक सेकंदात पुढे ढकलले जावे तसे झाले. 

आगबोटी तयार करण्याचा माझगावच्या गोदीतला कारखाना पहाण्याची एक संधी मला मिळाली, तेंव्हा तिथे काही युध्दनौकांची बांधणी चाललेली होती. शिंप्याने शर्ट पँट्सची कापडे खुणा करून कराकरा कापावीत तेवढ्या सहजतेने तिथे अवाढव्य आकारांचे पोलादाचे पत्रे कापले जात होते. त्यांच्या ड्रॉइंग्जची फिल्म एका प्रोजेक्टरमध्ये लावलेली असे आणि त्या पत्र्यांवर आधी अंधार करून ते प्रकाशचित्र प्रोजेक्ट करून खडूने गिरवून घेतले जात होते. अशा प्रकारची यंत्रणा मी कुठेच पाहिली नव्हती. पुढे एका यंत्राला जोडलेल्या टॉर्चने त्या पत्र्यांचे चित्रविचित्र आकारांचे तुकडे त्यांच्या ड्रॉइंगप्रमाणे कापले जात होते. पंधरावीस मिलिमीटर आणि त्यापेक्षाही जाड पत्र्यांचे आणि त्यांना कापून तयार केलेल्या मोठमोठ्या आकारांचे ढीग पाहूनच हे काम किती मोठे असते याची कल्पना येत होती. ते तुकडे एकमेकांना जोडण्याचे कामसुध्दा स्वयंचलित यंत्रांकडूनच चालले होते. अर्थातच ती यंत्रे चालवण्यासाठी कुशल कामगार तिथे तैनात होतेच. इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारे वेल्डिंग मी त्यानंतरही पुन्हा कधी पाहिले नाही. त्या कारखान्यात काही युध्दनौकांचे सांगाडे उभे होते, तर काहींवर इतर उपकरणे बसवण्याचे काम चालले होते. ते सगळे वरवर पाहूनसुध्दा त्यांचे आकार (साइझ) आणि त्यातली गुंतागुंत (कॉम्प्लेक्सिटी) यांची कल्पना आली.  

अणुशक्तीवर चालणा-या भारतीय बनावटीच्या पहिल्या पाणबुडीच्या रिअॅक्टरचे काम अणुशक्ती खात्यामध्ये होत होते. याबाबत अत्यंत कडक गोपनीयता पाळली जात असल्यामुळे ते कोणाकडे होते हे कधीच समजू दिले जात नसले तरी कुठेतरी तशा प्रकारचे काम चालले असल्याची अस्पष्ट कुणकुण कानावर येत होती. बाहेरच्या ज्या कारखान्यांमध्ये आमच्या पॉवर प्रॉजेक्टसाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार केली जाते त्याच कारखान्यात संरक्षण खात्यासाठी लागणारी विशिष्ट प्रकारची यंत्रसामुग्रीही बाजूलाच तयार होत असल्यामुळे तीही दिसत असे. त्यात रिअॅक्टरशी संबंधित असलेले भागही असायचे. त्यांची नावे आणि उपयोग त्या कारखान्यातल्या लोकांपासून सुध्दा गुप्त ठेवली जातात किंवा त्यांना मुद्दाम भलतीसलती किंवा भोंगळ वाटणारी नावे दिली जातात. असे असले तरी त्यांची रचना आणि आकार पाहून ते समजू शकणा-यांना थोडा अंदाज येत होता. अणुशक्तीसाठी उपयोगात येणारी सर्वच उपकरणे आणि यंत्रसामुग्री निर्माण करतांना त्या कामात विशेष प्रकारची काळजी घेतली जाते. त्यासाठी लागणारी प्रोसीजर्स, स्पेसिफिकेशन्स वगैरे एकदम वेगळी असतात. ती तयार करून त्यानुसार या कारखान्यांमध्ये सगळे काम करवून घेण्याची सुरुवात आमच्या पिढीने केली होती. त्यापूर्वीच्या काळात तिथे साखर, सिमेंट यासारख्या कारखान्यांची यंत्रसामुग्री तयार होत असे. त्यांच्या कार्यपध्दतीत अनेक प्रकारच्या आमूलाग्र सुधारणा घडवून आणून आणि नवीन प्रकारची यंत्रसामुग्री, इन्स्पेक्शनची उपकरणे वगैरे आणून त्यांच्या कामाचा दर्जा अणुशक्तीच्या कामासाठी आवश्यक इतका उंचावण्यात आम्ही खूप मदत केली होती. या सर्वांचा उपयोग ही पाणबुडी बनवण्याच्या कामात केला जात होताच. अशा प्रकारे अप्रत्यक्ष रीतीने त्या कामाला कुठेतरी माझाही स्पर्श झाला होता. काही दिवसांपूर्वी अरिहंत या नावाच्या पाणबुडीवरील रिअॅक्टर क्रिटिकल झाल्याची बातमी वाचली तेंव्हा या आठवणी झर्रकन डोळ्यासमोर येऊन गेल्या.

होडी ते पाणबुडी यांच्या मधल्या जहाज, गलबत, आगबोट वगैरेंशी माझा कधीच संबंध आला नसला तरी होडी, नावा वगैरेंच्या खूप आठवणी माझ्या मनात आहेत. खरे पाहता रेल्वे आणि विमाने यातून मी शेकडो वेळा दूर दूरचे प्रवास केले आहेत. नावेमधून एकंदर जितके किलोमीटर मी हिंडलो असेन त्याच्या कित्येकशेहेपट आगगाडीमधून आणि कित्येक हजारपट अंतर विमानांमधून कापले आहे. पण तरीसुध्दा आठवणीत राहण्यासारखे असे काही अगदी लहान लहान प्रवास नावांमधून झाले आहेत. ते या निमित्याने सादर केले.