Friday, July 12, 2013

विठ्ठल किती गावा ? (भाग ३ )

संत तुकाराम महाराजांनी सुध्दा सर्वांगाने विठ्ठलाची भक्ती करण्याचा उपदेश दिला असला तरी वाणीमधून त्याचे गोड नाम घेण्यावर जास्त भर दिला आहे हे यापूर्वीच्या भागात पाहिले. संत नामदेवांचा जास्त भर विठोबाच्या दर्शनावर दिसतो. संत नामदेव महाराज विठ्ठलाचे अत्यंत लाडके भक्त समजले जातात. विठोबा त्यांच्याशी बोलतो, त्यांनी नैवेद्यासाठी दिलेली खीर प्रत्यक्ष प्रकट होऊन खातो वगैरे कथा प्रसिध्द आहेत. त्यांच्या अभंगांमध्येसुध्दा विठ्ठलाबरोबर असलेली त्यांची सलगी कधी कधी दिसून येते. विठ्ठलाच्या मुखाकडे पाहताच तहान भूक यांचाही विसर पडतो, पाप, ताप, दुःख नाहीसे होऊन जातात, वासना गळून पडतात. त्याला भेटतांना आईच्या कशीत शिरल्यासारखा आनंद होतो. चकोर पक्षी चंद्राला पाहण्यासाठी आसुसलेला होऊन अत्यंत आतुरतेने त्याच्या उगवण्याची वाट पहात असतो, आकाशात ढग जमलेले पाहून मोराला आनंदाचे भरते येते आणि तो थुई थुई नाचू लागतो, अशाच प्रकारे नामदेवांनाही विठ्ठलाच्या मुखकमलाच्या दर्शनाची अतीव ओढ लागलेली असते आणि ते होताच त्यांना अत्यानंद होतो असे ते खाली दिलेल्या अभंगात सांगतात.

सुखाचें हे सुख श्रीहरी मुख ।
पाहतांही भूक तहान गेली ॥१॥
    भेटली भेटली विठाई माऊली ।
    वासना निवाली जिवांतील ॥२॥
चंद्रासी चकोर मेघासी मयूर ।
वाटे तैसा भर आनंदाचा ॥३॥
    नामा म्हणे पाप आणि ताप दुख: गेले ।
    जाहलें हें सुख बोलवेना ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Sukhache_He_Sukh_Shri


संत नामदेव महाराजांना विठ्ठलाच्या दर्शनाची किती तीव्र ओढ लागलेली असायची हे वरील अभंगात त्यांना सांगितले आहे. खालील अभंगात हेच व्यक्त करून विठोबाची भेट झाल्यानंतर काय काय करायचे त्यांनी मनात योजलेले असते त्याचीही यादी ते देतात. विठ्ठलाचे मुखकमल आधीच मनोरम आहेच, त्याच्या अंगाला उटी लावून, कपाळावर कस्तुरीचा टिळा लावून आणि जाईजुईच्या फुलांच्या माळा त्याच्या गळ्यात घालून त्याला अधिक सुशोभित आणि सुगंधित करायचे. हे झाल्यावर मग तर त्याच्या दर्शनाने डोळ्याचे पारणे फिटल्याशिवाय राहणार नाही.

पाहू द्या रे मज विठोबाचे मुख ।
लागलीसे भूक डोळां माझ्या ॥१।।
   कस्तुरी कुंकुम भरोनिया ताटी ।
   अंगी बरवी उटी गोपाळाच्या ।।२।।
जाई-जुई पुष्पे गुंफुनिया माळा ।
घालू घननीळा आवडिने ॥३।।
   नामा म्हणे विठो पंढरीचा राणा ।
   डोळिंया पारण होत असे ॥४।।
http://www.aathavanitli-gani.com/Song/Pahu_Dya_Re_Maj


विठ्ठलाच्या दर्शनाची इतकी गोडी संत नामदेवांना लागली होती की ते रोज त्रिकाल घेता यावे यासाठी पंढरपूरलाच कायमचे वास्तव्य करावे, फक्त या जन्मातच नव्हे तर जन्मोजन्मी ते करायला मिळावे अशी प्रार्थना ते विठोबाला करतात. पंढरीला रहायचे झाल्यास रोज चंद्रभागा नदीत स्नान, संतमंडळींचे दर्शन आणि विठ्ठलमंदिराच्या महाद्वारापाशी त्याचे कीर्तन वगैरे अनेक लाभ त्यातून मिळवता येतील. पंढरपूरच्या विठोबाच्या देवळाच्या पायरीपाशीच नामदेवांची समाधी आहे. त्यामुळे त्यांची ही इच्छा विठ्ठलाने मान्य केली असे दिसते. पण संत नामदेव कायम पंढरपूरला राहिले नाहीत, त्यांनी त्या काळात भारतभ्रमण केले, अगदी पंजाबपर्यंत जाऊन आले आणि त्यांनी सगळीकडे भागवतधर्माचा प्रसार केला असे म्हणतात. त्यांनी लिहिलेल्या कृतींचा समावेश शीखधर्मीयांच्या ग्रंथसाहेबातसुध्दा केलेला आहे.

पंढरीचा वास, चंद्रभागे स्‍नान ।
आणिक दर्शन विठोबाचे ॥१॥
   हेची घडो मज जन्मजन्मांतरी ।
   मागणे श्रीहरी नाही दुजे ॥२॥
मुखी नाम सदा संतांचे दर्शन ।
जनी जनार्दन ऐसा भाव ॥३॥
   नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी ।
   कीर्तन गजरी सप्रेमाचे ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Pandharicha_Vaas

पंढरपूरला वास्तव्य करण्याची संत नामदेवांनी विठ्ठलाला मागणी केली होती हे वरील अभंगात स्पष्ट होतेच. पंढरीच्या रहिवाशांना ही संधी मिळत असल्यामुळे ते सगळे पावन झाले आहेत कारण त्यांचे देणे, घेणे, काम करणे वगैरे संपूर्ण जीवन कसे विठ्ठलमय आणि त्यामुळे आनंदमय झालेले आहे,  हे त्यांनी पुढील अभंगात सांगितले आहे.

पंढरीचे जन अवघे पावन ।
ज्या जवळी निधान पांडुरंग ॥१॥
    विठ्ठलनामें घेणें विठ्ठलनामें देणें ।
    विठ्ठलनामें करणें सकळ काम ॥२॥
विठ्ठलनामी गोडी धरोनी आवडी ।
विठ्ठलनामीं बुडी दिल्ही जेणें ॥३॥
     नामा म्हणे अवघें विठ्ठलचि झालें ।
     विठ्ठलें दिधलें प्रेमसूख ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Pandhariche_Jan_Avaghe  

संत नामदेवांनी विठ्ठलाच्या दर्शनावर अनेक अभंग लिहिलेले आहेतच, त्यांनीही विठ्ठलाच्या नाममहात्म्याबद्दलसुध्दा अभंग लिहिलेले आहेतच. त्यातल्या एका अभंगाला श्रीधर फडके आणि सुरेश वाडकर या द्वयीने नवीन पध्दतीच्या संगीतामधून खूपच श्रवणीय असे रूप दिले आहे.

विठ्ठल आवडी प्रेमभावो । विठ्ठल नामाचा रे टाहो ।
तुटला हा संदेहो । भवमूळ व्याधीचा  ॥१॥
म्हणा नरहरी उच्‍चार । कृष्ण हरी श्रीधर ।
हेची नाम आम्हा सार । संसार करावया प्रेमभावो ॥२॥
नेणो नामाविण काही । विठ्ठल कृष्ण लवलाही ।
नामा म्हणे तरलो पाही । विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥३॥
http://www.youtube.com/watch?v=gO8A_ivui7s

संत नामदेवांना विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली आहे, त्याचे नामस्मरण करण्याची खूप इच्छा मनात उफाळली आहे, पण कां कुणास ठाऊक, ते इतस्ततः भरकटते आहे, मनात इतर विकार, वासना वगैरेंनी थैमान मांडले आहे, कधी झोपेची पेंग येते आहे, पण त्यांचे मन विठ्ठलाच्या नामावर एकाग्र होत नाही. यामुळे चिंतित होऊन ते देवालाच विचारतात की "आज माझे मन तुझे गोड नाव का घेत नाही आहे?, मी त्यासाठी आता काय करू?" यातल्या भावाचा काडीमात्र अर्थ मला लहान असतांना समजत नव्हता. "केशवा, पंढरीराया" अशी विठ्ठलाला हाक मारून पुन्हा "तुझं नावसुध्दा मनात का येत नाही?" असे नामदेव का म्हणत आहेत ते समजत नव्हते. पण त्याची अतीशय गोड चाल खूप आवडत असल्यामुळे हे गाणे मनात पक्के घर करून बसले होते.  माझ्या लहानपणीच्या टॉप टेन गाण्यात हे अजरामर गीत नक्कीच होते. आजही हे गाणे काही कार्यक्रमांमध्ये ऐकायला मिळते.

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ।
मन माझे केशवा का बा न घे ॥१॥
   सांग पंढरीराया काय करु यांसी ।
   का रूप ध्यानासी न ये तुझे ॥२॥
किर्तनी बैसता निद्रे नागविले ।
मन माझे गुंतले विषयसुखा ॥३॥
    हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती ।
    न ये माझ्या चित्‍ती नामा म्हणे ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Amrutahuni_God_Naam

.  . . . . .  . . . . . . . . . . . .  . . . (क्रमशः)

No comments: