Wednesday, July 11, 2012

पावसाची गाणी - भाग ५

पूर्वीचे भागः-


भाग १ http://anandghan.blogspot.in/2012/06/blog-post_28.html

भाग २ http://anandghan.blogspot.in/2012/07/blog-post.html

भाग ३ - http://anandghan.blogspot.in/2012/07/blog-post_08.html

भाग ४ - http://anandghan.blogspot.in/2012/07/blog-post_10.html
निसर्गाचा परिणाम मनावर होतोच, पण कधी कधी मनातल्या भावनांमुळे निसर्गाचे रूप वेगळे भासते. आज तसाच पडत असलेला पाऊस कालच्या पावसाहून वेगळा वाटायला लागतो. संगीता जोशी यांनी लिहिलेल्या आणि श्रीधर फडके यांनी गायिलेल्या या गीताला सुप्रसिध्द संगीतकार श्री.यशवंत देव यांनी अत्यंत भावपूर्ण चाल लावली आहे. श्री यशवंत देव यांनी 'शब्दप्रधान गायकी' या विषयावर पुस्तक लिहिले आहे आणि ते यावर प्रात्यक्षिकासह कार्यक्रम करतात. अर्थातच त्यांच्या गाण्यांमधले सर्व शब्द स्पष्ट ऐकू येतात आणि चांगले समजतात.

जो काल इथे आला तो पाऊस वेगळा होता ।
आभाळ निराळे होते, तो मेघ वेगळा होता ।।
ओलेत्या चिंब क्षणीही रक्तात निखारे होते ।
ती जुनीच होती सलगी, पण स्पर्श कोवळा होता ।।
वेचली फुले थेंबांची ओठही फुलांचे होते ।
डोळ्यांत पावसामधला निथळता जिव्हाळा होता ।।

पाऊस असा आला की अद्याप थांबला नाही ।
ह्या अशा पावसासाठी सोसला उन्हाळा होता ।।
जीवनदायी पाऊस कधी कधी रौद्ररूप धारण करतो आणि विध्वंस करतो. अशा धिंगाणा घालू पाहणा-या पावसाला उद्देशून सुप्रसिध्द कवयित्री इंदिरा संत चार गोष्टी एका सुंदर कवितेत सांगतात.  "माझे चंद्रमौळी घरकूल, दारातला नाजुक सायलीचा वेल वगैरेंना धक्का लावू नको, छप्पराला गळवू नको, माझे कपडे भिजवू नकोस वगैरे सांगून झाल्यानंतर माझ्या सख्याला सुखरूप आणि लवकर घरी परतून आण, त्यानंतर वाटेल तेवढा धुमाकूळ घाल, मी तुला बोल लावणार नाही, तुझी पूजाच करीन." श्री.यशवंत देव यांनी लावलेल्या अत्यंत भावपूर्ण चालीवर गायिका पुष्पा
पागघरे यांनी हे गाणे गायिले आहे.

नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी ।
घर माझे चंद्रमौळी, आणि दारात सायली ।।

नको नाचू तडातडा, अस्सा कौलारावरून ।
तांबे सतेली पातेली, आणू भांडी मी कोठून ।।

नको करू झोंबाझोंबी, माझी नाजूक वेलण ।
नको टाकू फूलमाळ, अशी मातीत लोटून ।।

आडदांडा नको येऊ, झेपावत दारांतून ।
माझं नेसूचं जुनेर, नको टाकू भिजवून ।।

किती सोसले मी तुझे, माझे एवढे ऐकना ।.
वाटेवरी माझा सखा, त्याला माघारी आणा ना ।।

वेशीपुढे आठ कोस, जा रे आडवा धावत ।
विजेबाई कडाकडून मागे फिरव पांथस्थ ।।

आणि पावसा, राजसा, नीट आणि सांभाळून ।
घाल कितीही धिंगाणा, मग मुळी न बोलेन ।।

पितळेची लोटीवाटी, तुझ्यासाठी मी मांडीन ।
माझ्या सख्याच्या डोळ्यांत तुझ्या विजेला पूजीन ।।

आपल्याला हव्या असलेल्या खुबीने सांगण्याचे कौशल्य स्त्रियांमध्ये उपजत असते. सोंगाड्या या चित्रपटातल्या या लावणीत कवी वसंत सबनीसांनी ही गोष्ट किती खुमासदार पध्दतीने दाखवली आहे पहा. तमाशाप्रधान चित्रपटांना संगीत देण्यात हातखंडा असलेल्या राम कदमांनी लावलेल्या चालीवर हे गाणेसुध्दा पुष्पा पागघरे यांनीच गायिले आहे.

नाही कधी का तुम्हास म्हटलं, दोष ना द्यावा फुका ।
अन्‌ राया मला, पावसात नेऊ नका ।।

लई गार हा झोंबे वारा ।
अंगावरती पडती धारा ।
वाटेत कुठेही नाही निवारा ।
भिजली साडी भिजली चोळी, भंवतील ओल्या चुका ।।
अन्‌ राया मला, पावसात नेऊ नका ।।
खबूतरागत हसत बसू या ।
उबदारसं गोड बोलू या ।
खुळ्या मिठीतच खुळे होऊ या ।
लावून घेऊ खिडक्या दारं, पाऊस होईल मुका ।।
अन्‌ राया मला, पावसात नेऊ नका ।।

ग्रामीण चित्रपटांना स्व.दादा कोंडके यांनी एक वेगळेच वळण लावले आणि लोकप्रियतेचे उच्चांक गाठून चमत्कार करून दाखवले. त्यांच्या सगळ्याच गाण्यांनी भरपूर खळबळ माजवली होता, त्यातल्या एका गाण्याने तर काही काळ अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यातला मुखडा सोडला तर कुठेच पावसाचा उल्लेख येत नाही आणि मुखडा पण थोडा विचित्रच वाटतो. कसा ते पहाच.

जसा जीवात जीव घुटमळं ।
तसा पिरतीचा लागतयं बळ ।
तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळं ।
ह्ये बघून दुष्मन जळं ।
वर ढगाला लागली कळ ।
पाणी थेंब थेंब गळं ।।

चल गं राणी, गाऊ या गाणी, फिरूया पाखरासंग ।
रामाच्या पार्‍यात, घरघर वार्‍यात, अंगाला भिडू दे अंग ।
जेव्हा तुझं नि माझं जुळं, पाणी थेंब थेंब गळं ।।

सुंदर मुखडा, सोन्याचा तुकडा, कुठे हा घेऊन जावा ।
काय बाई अप्रित, झालया विपरीत, सश्याला भितुया छावा ।
माझ्या पदरात पडाळंय खुळं, पाणी थेंब थेंब गळं ।।

जमीन आपली, उन्हानं तापली, लाल लाल झालिया माती ।
करूया काम आणि गाळूया घाम, चला पिकवू माणिकमोती ।
एका वर्षात होईल तिळं, पाणी थेंब थेंब गळं ।।

शिवार फुलतय, तोर्‍यात डुलतय, झोक्यात नाचतोय धोतरा ।
तुरीच्या शेंगा दावतात ठेंगा, लपलाय भूईमूग भित्रा ।
मधे वाटाणा बघ वळवळ, पाणी थेंब थेंब गळं ।।

बामनाच्या मळ्यात, कमळाच्या तळ्यात, येशील का संध्याकाळी ।
जाऊ दुसरीकडं, नको बाबा तिकडं, बसलाय संतू माळी ।
म्हाताऱ्याला त्या लागलाय चळ, पाणी थेंब थेंब गळं ।।

झाडावर बुलबुल, बोलत्यात गुलगुल, वराडतिया कोकिळा ।
चिमणी झुरते उगीच राघू मैनेवरती खुळा ।
मोर लांडोरीसंगं खेळं, पाणी थेंब थेंब गळं ।।

थुईथुई नाचते, खुशीत हासते, मनात फुलपाखरु ।
सोडा की राया, नाजूक काया, नका गुदगुल्या करु ।
तू दमयंती मी नळ, पाणी थेंब थेंब गळं ।।

आलोया फारमात, पडलोय पिरमात, सांग मी दिसतोय कसा ।
अडाणी ठोकळा, मनाचा मोकळा, पांडू हवालदार जसा ।
तुझ्या वाचून जीव तळमळं, पाणी थेंब थेंब गळं ।।



. . . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

पुढील भाग

No comments: