Tuesday, July 10, 2012

पावसाची गाणी - भाग ४

पूर्वीचे भागः
भाग १ http://anandghan.blogspot.in/2012/06/blog-post_28.html


भाग २ http://anandghan.blogspot.in/2012/07/blog-post.html

भाग ३ - http://anandghan.blogspot.in/2012/07/blog-post_08.html



"जे न देखे रवि ते देखे कवी" असे म्हणतात. पावसाळ्याच्या दिवसात ढगाआड झाकून गेल्यामुळे सूर्यालाही कदाचित पृथ्वीवरचे स्पष्ट दिसत नसेल, पण अंधारातले किंवा अस्तित्वात नसलेले सुध्दा पाहण्याची दिव्यदृष्टी कवींकडे असते. तरीही ते स्वतः मात्र सहसा फारसे नजरेला पडत नाहीत. बालकवी ठोंबरे ज्या काळात होऊन गेले तेंव्हा दृकश्राव्य माध्यमे नव्हतीच, पण टेलिव्हिजन आल्यानंतरच्या काळातसुध्दा सुप्रसिध्द कवींचेही दर्शन तसे दुर्मिळच असते. स्व.ग.दि.माडगूळकरांना त्यांनी काम केलेल्या चित्रपटांमधील भूमिकांमध्ये मी पाहिले. त्यांच्या सुंदर कविता त्यांच्याकडून ऐकायची संधी कधी मिळाल्याचे आठवत नाही. सुरेश भट, आरती प्रभू, पी.सावळाराम वगैरे नावे हजारो वेळा ऐकली असली तरी त्यांना क्वचितच पाहिले असेल. यशवंत देव यांना अनेक वेळा जवळून पहायची संधी मिळाली, पण एक संगीतकार, गायक, विद्वान, विचारवंत, फर्डा वक्ता वगैरे म्हणून. प्रवीण दवणे यांना निवेदन करतांना पाहिले. मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि विंदा करंदीकर या त्रिमूर्तींनी काव्यवाचन या प्रकाराला प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यातील वसंत बापट यांना एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतांना आणि विंदा करंदीकर यांना सत्कारमूर्ती म्हणून मी पाहिले. मंगेश पाडगावकर हे मात्र मला त्यांच्या कविता कळू आणि आवडू लागल्यापासून नेहमी नजरेसमोर येत राहिले आहेत. त्यांचे कार्यक्रम काही वेळा प्रत्यक्ष आणि अनेक वेळा टीव्हीवर पाहिले असल्यामुळे ते जवळचे वाटतात. माझ्या पिढीला मंगेश पाडगांवकरांच्या गीतांनी नुसतीच भुरळ घातली नाही तर जीवनाचा आस्वाद घेण्याची एक दृष्टी दिली. बहुधा प्रथम मराठी आकाशवाणीवर आलेले आणि तुफान प्रसिध्दी पावलेले, अरुण दाते यांनी गायिलेले आणि पाडगावकर यांनी लिहिलेले पावसाच्या संदर्भातले एक अत्यंत भावपूर्ण प्रेमगीत पहा.


भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची ।
धुंद वादळाची होती रात्र पावसाची ।।
कुठे दिवा नव्हता, गगनी एक ही न तारा ।
आंधळ्या तमातुन वाहे आंधळाच वारा ।
तुला मुळी नव्हती बाधा भीतिच्या विषाची ।।
क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती ।
नावगाव टाकुनि आली अशी तुझी प्रीती ।
तुला परी जाणिव नव्हती तुझ्या साहसाची ।।
केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली ।
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली ।
श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची ।।

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास ।
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास ।
सुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची ।।
अचाट कल्पकता आणि अद्भुत भाषासौंदर्य याचे सुरेख मिश्रण मला त्यांच्या कवितांमध्ये दिसते. मुख्य म्हणजे त्यांची अलंकारिक भाषा आणि त्यातील रूपके प्रतिमा वगैरे माझ्या पार डोक्यावरून जात नाहीत. वर्षा ऋतूमधील सृष्टीचे रंग आणि गंध आपल्यासमोर साक्षात उभे करणारे पाडगावकरांनी लिहिलेले आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबध्द केलेले स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे हे गाणे पहा.
श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा ।
उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा ।।

जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी ।
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी ।
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा ।।

रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी ।
निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी ।
गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा ।।

पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आले ।
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले ।
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा ।।

पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा ।
अशा प्रीतिचा नाद अनाहत, शब्दावाचुन भाषा ।
अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा ।।

संगीतकाराने दिलेल्या तालासुरावर शब्द गुंफून गीतरचना करणे मंगेश पाडगावकर यांना पसंत नव्हते. तसे त्यांनी कधीच केले नाही, त्यांनी लिहिलेल्या कविता त्यांना अंतःप्रेरणेने स्फुरतात असे ते आपल्या कार्यक्रमांमध्ये सांगतात. त्यामुळे त्यांच्या नावावर चित्रपटगीते दिसणार नाहीत. पण कवितेचे गाणे व्हायचे असल्यास तिची रचना एकाद्या वृत्तानुसार किंवा ठेक्यावर केलेली असणे आवश्यक असते. संगीताची उत्तम जाण पाडगावकरांना असणार आणि त्यामुळेच तालावर व्वस्थित बसणारे नादमय शब्द गुंफून त्यांनी रचना केली आहे हे त्यांची गोड गीते ऐकतांना लक्षात येते. त्यांनी मुख्यतः भावगीते लिहिली असली तरी अगदी विडंबनासकट इतर प्रकारची गाणीसुध्दा लिहिली आहेत. त्यांनी पावसावर लिहिलेले एक मजेदार गाणे ज्यांना लहानपणी अत्यंत आवडले होते असे सांगणारे लोक आता वयस्क झाले आहेत, प्रश्न ऐकून मुंडी हलवणा-या नंदीबैलाला घेऊन रस्त्यावर हिंडणारे लोक दिसेनासे झाले आहेत, त्यामुळे आजच्या काळातल्या मुलांना त्यांचा संदर्भ लागणे कठीण झाले आहे, असे असले तरी या गाण्याचे शब्द आणि चाल यामुळे हे गाणे मात्र अजून लहान मुलांना आकर्षक वाटते.

सांग सांग भोलानाथ
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचुन, सुट्टी मिळेल काय ?

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?

भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा ,
आठवड्यातून रविवार, येतील का रे तीनदा ?

भोलानाथ उद्या आहे, गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ?

भोलानाथ भोलानाथ चॉकलेट मिळेल काय ?
आकाशातून वेफर्सचा पाऊस पडेल काय ?

भोलानाथ जादूचा शंख मिळेल काय ?
भोलानाथ परीसारखे पंख देशील काय ?

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?

आरती, पूजा, अक्षता यासारखी नावे मुलींना ठेवणे अजून सुरू झाले नव्हते त्या काळात प्रसिध्दीला आलेले आरती प्रभू हे नाव ऐकून ते एका कोवळ्या कॉलेजकुमारीचे नाव असेल असेच त्या काळात कोणालाही वाटले असते, पण चिं.त्र्यं,खानोलकर असे भारदस्त नाव असलेल्या एका प्रौढ माणसाने हे टोपणनाव धारण केले आहे असे समजल्यानंतर आपण कसे फसलो याचा विचार करून त्याला त्याचेच हंसूही आले असेल. त्यांनी लिहिलेल्या एका कवितेवर एक लेख वाचला होता. त्यात असे लिहिले होते की खाली दिलेल्या कवितेचे ध्रुपद आणि पहिले कडवे खानोलकरांनी खूप पूर्वी लिहिले होते आणि ती अर्धवटच सोडून दिली होती. कदाचित त्या वेळी त्यांना ती तेवढीच पुरेशी वाटलीही असेल. पुढे अनेक वर्षांनंतर त्यांच्या काही गीतांना पं.हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत देऊन त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या आणि त्यांचे सोने झाले. त्या वेळी ही कविता बाळासाहेबांच्या वाचण्यात आली आणि त्यांनी बोलता बोलता त्याला चाल लावून ती गुणगुणून पाहिली. यातून एक मस्त गीत तयार होईल असे दोघांनाही वाटले आणि ते करायचे त्यांनी ठरवले. पण यासाठी एवढे लहानसे गाणे पुरेसे न वाटल्यामुळे आरती प्रभूंनी आणखी दोन कडवी लिहून दिली. या गाण्याचा अर्धा भाग एका वयात असतांना अंतःप्रेरणेने स्फुरला असेल आणि उरलेला भाग वेगळ्याच वयात आल्यानंतर मार्केटसाठी विचार करून रचला असेल असे हे गाणे ऐकतांना कधीच जाणवले नाही.

ये रे घना, ये रे घना, न्हाउ घाल माझ्या मना ।।

फुले माझि अळुमाळु, वारा बघे चुरगळू ।
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना ।।

टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार ।
नको नको म्हणताना, मनमोर भर राना ।।

नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू ।
बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना ।।


ना.धों.महानोर यांची आता आजकालचे निसर्गकवी अशी ओळख तयार झाली आहे. ग्रामीण भागाचे दर्शन त्यांच्या कवितांमध्ये होत असल्यामुळे त्यात निसर्गाला मोठे स्थान असतेच. पावसाच्या आठवणीतूनच मनाला चिंब भिजवणारे त्यांचे हे सुप्रसिध्द गीत नव्या पिढीमधील संगीतकार कौशल इनामदार यांनी स्वरबध्द केले आहे.

मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले ।
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले ।।

पाऊस पाखरांच्या पंखांत थेंब थेंबी ।
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी ।।
मन चिंब पावसाळी .......

घरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारा ।
गात्रात कापणारा ओला फिका पिसारा ।
या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे ।
आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे ।।
मन चिंब पावसाळी .......

रानात एककल्ली सुनसान सांजवेळी ।
डोळ्यात गल्बताच्या मनमोर रम्य गावी ।
केसात मोकळ्या त्या वेटाळुनी फुलांना ।
राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे ।।
मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले
त्या राजवंशी कोण्या डोळ्यात गुंतलेले
मन चिंब पावसाळी …



. . . . . . .. . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

पुढील भाग

1 comment:

ऊर्जस्वल said...

सुरस गीतांच्या मधूर आठवणींत माझेही मन रमले. पावसांच्या गाण्यांचा हा किस्साही मला आवडला!