Tuesday, June 09, 2009

ग्रँड युरोप - भाग ३७ समारोप



समारोप
दोन आठवड्यांच्या युरोपच्या सहलीचा जितका माझ्या स्मरणांत घर करून राहिला तेवढा सविस्तर वृत्तांत मी मागील छत्तीस भागांत दिला। माझ्या अनुभवाच्या शिदोरीमधल्या इतर चार गोष्टी त्या निमित्याने सांगितल्या. युरोपमध्ये घेतलेल्या अनुभवांचा भारतातील परिस्थितीच्या संदर्भात अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. "मनांत आले ते लिहिले" या माझ्या भूमिकेशी ते सुसंगत वाटावे. या ब्लॉगवरील आतापर्यंतची ही सर्वात मोठी मालिका आहे. त्यामुळे तिच्या समारोपासाठी हा स्वतंत्र भाग लिहीत आहे.



"थोड्या दिवसात बरेच कांही पहायला मिळावे" हा या सहलीचा उद्देश युरोपमध्ये फिरतांना पूर्णपणे सफळ झाला असे म्हणायला यत्किंचित हरकत नसावी. त्या पाहण्यामध्ये सुद्धा प्रचंड वैविध्य होते. निखळ निसर्गाची अनुपम रूपे स्विट्झर्लंडमध्ये पहायला मिळाली तर मानवी प्रयत्नाने घडवून आणलेला निसर्गाचा फुलोरा ट्यूलिपच्या बागेत दिसला. भव्य ऐतिहासिक इमारतींचे अवशेष पाहिले, तसेच आजही सुस्थितीत ठेवलेल्या इतिहासकाळांतल्या अद्भुत वास्तू पहायला मिळाल्या. गतकाळातील ऐश्वर्याची साक्ष देणा-या नेत्रदीपक कलाकृतींचे दर्शन घडले. चित्रकला, शिल्पकला, वास्तुशिल्प, नगररचना इत्यादी अनेक अंगाने ते कलाविष्कार नजरेला पडले. त्याचप्रमाणे आजच्या युगातील चैतन्यमय कार्यक्रमांची रंगत अनुभवायला मिळाली. कलाकारांची कल्पकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाची किमया या दोहोंच्या संगमामधून साकार झालेले चमत्कारसुद्धा पहायला मिळाले. यामधील कांही अनुभव कल्पनेच्या पलीकडे चित्तथरारक होते, कांही अपेक्षेनुसार मनोहर होते, तर कांही आधी वाटले होते तितके कदाचित भावले नाहीत. असे असले तरी त्यामधून जे समाधान पदरात पडले ते सकारात्मकच होते. कष्ट, निराशा, पीडा अशा प्रकारचे नकारात्मक अनुभव कधीच आले नाहीत. एका वाक्यात सांगायचे तर खूप मजा आली.


पण ही मजा केवढ्याला पडली असा विचार व्यवहारी मन करते. खर्चाच्या बाजूला दोन मुख्य बाबी होत्या. या सहलीत माझे दोन आठवडे गेले आणि बरेचसे पैसे खर्च झाले. या जमाखर्चाचा ताळेबंद मांडून अखेरीस निव्वळ नफा पदरात पडला की हा आतबट्ट्याचा व्यवहार झाला हे ठरवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यानुसार निरनिराळ्या लोकांची वेगवेगळी उत्तरे येतील. एवढेच काय पण मी स्वतः हे गणित आयुष्याच्या निरनिराळ्या अवस्थेतून जातांना वेगवेगळ्या पद्धतीने सोडवून पाहिले आणि त्यातून प्रत्येक वेळी निराळे निष्कर्ष निघाले होते.

व्यापार उद्योगाच्या क्षेत्रांत "वेळ म्हणजेच पैसा" असे समीकरण मांडले जाते. अकुशल अथवा कुशल कामगार आणि अधिकारी वर्ग यांनी केलेल्या सर्व कामासाठी खर्चिलेल्या वेळेचा सविस्तर हिशोब ठेवला जातो आणि त्याचे मूल्य जमाखर्चात मांडले जाते. प्रत्येक माणसाची पात्रता, ज्येष्ठता आणि अनुभव या वरून त्या वेळेचे मूल्य ठरते. सर्वसाधारणपणे ते त्याच्या नियमित कमाईच्या प्रमाणात असते. पगारदार नोकरांचा ओव्हरटाईम, लीव्ह एन्कॅशमेंट वगैरेचा हिशोब त्या आधारावरच करतात. पण हे सगळे त्या काळात केलेल्या कामाच्या संदर्भात असते. केवळ मौजमजा करण्यासाठी कोण पैसे देणार आहे? 'भटकंती' यासारख्या कार्यक्रमात भाग घेणा-या कलावंतांना ते मिळतात खरे. कांही महत्वाच्या सभा, संमेलने, कार्यशाळा यांमध्ये हजर राहण्यासाठी विमानाने जाण्यायेण्याचा आणि उच्च दर्जाच्या हॉटेलांत राहण्याचा खर्च मला सुद्धा मिळाला आहे ती गोष्ट वेगळी. कारण त्या जागी उपस्थित राहणे हा सुद्धा त्या वेळी माझ्या कामाचाच एक भाग होता. पण या वेळेस युरोपच्या टूरसाठी लागणारा वेळ आणि येणारा खर्च माझा मलाच द्यायचा होता.

कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीसाठी खर्च होणा-या वेळेचे योग्य मूल्यमापन करणे कठीण असते. प्रेमी युगुले किंवा नवदंपतीला एकमेकांच्या सहवासात वेळ घालवणे हेच सर्वात जास्त महत्वाचे वाटते तर तान्ह्या बाळाच्या मातेला सतत बाळासोबत राहणे आवश्यक असते. त्यांनी त्यासाठी घालवलेला वेळ अमोल असतो. जीवनातील कित्येक आनंदाचे क्षण पैसे देऊन विकत घेता येत नाहीत किंवा दुःखाचे क्षण पैशाने टाळता येत नाहीत. पैसै खर्च करून आपण तो आनंद साजरा करू शकतो किंवा दुःखाची दाहकता कमी करण्याचा प्रयत्न करतो एवढेच. असे असेल तर रिकाम्या वेळेचे मूल्य कसे ठरवायचे?

यासाठी बहुतेक लोक दोन मापदंडाचा उपयोग करतांना दिसतात. त्या वेळेत आपण एरवी काय केले असते हा पहिला विचार तो करतो. आपण त्या गोष्टीशिवाय आणखी काय काय करण्याच्या शक्यता होत्या हा दुसरा. त्यापासून आपल्याला कोणता लाभ झाला असता किंवा होऊ शकला असता याचे मूल्यमापन करून तो आपले निर्णय घेत असतो. हे अगदी आपल्या नकळत आपल्या मनात चाललेले असते. आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यात या दोन विचारांचे पारडे जड होत गेले होते. बहुतेक वेळी हांतात असलेले नित्याचे काम किंवा कौटुंबिक कर्तव्ये इतकी महत्वाची असत की कांही काळ ती न करणे माझ्यासाठी शक्य नसायचे. त्यांपेक्षाही अधिक महत्वाचे कार्य निघाले किंवा आणीबाणीची परिस्थिती आली तरच त्यांसाठी थोडा वेळ काढण्याची शक्यता असायची. त्यातूनही अधून मधून थोडी फुरसत मिळालीच तर आपल्या देशांतल्या सुंदर जागा पाहण्याचे आकर्षण तिकडे खेचून नेत असे. अशा प्रकारे जेंव्हा मोकळा वेळच उपलब्ध नव्हता तेंव्हा त्याचे मूल्यमापन करण्याचा प्रश्न उद्भवला नाही.

सेवानिवृत्तीनंतर या परिस्थितीत कमालीचा फरक पडला. दैनंदिन जबाबदा-यांमधून मुक्तता मिळाल्यावर उपलब्ध वेळ कसा घालवायचा हे माझ्या मीच ठरवायचे आहे. त्यामुळे या मापदंडांना विशेष अर्थ प्राप्त झाला. पहिला प्रश्न "मी एरवी काय केले असते?" याचे उत्तर मी जे कांही जानेवारी, फेब्रूवारी, मार्चमध्ये करीत गेलो तेच एप्रिलमध्ये केले असते. त्यापासून शक्य तितका आनंद मिळवण्याचा प्रयत्न मी जरूर केला असता पण त्यातून आर्थिक लाभ कांही झाला नसताच. दुसरा प्रश्न "याव्यतिरिक्त काय काय करू शकलो असतो?" यात फारसा दम नव्हता. जर करू शकलो असतो तर ते केले नसते कां? थोडक्यात म्हणजे माझ्या वेळेचे मूल्य या वेळी नगण्य होते.

प्रत्येक माणूस पैशाबद्दल सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागवाव्या लागतातच, त्याखेरीज आरोग्य, शिक्षण, मनोरंजन वगैरे ज्या इतर बाबींवर पैसे खर्च होतात, त्यासुद्धा त्याच्या जीवनासाठी आवश्यकच असतात. पण केवळ प्राथमिक गरजा भागवण्याच्या पलीकडे जाऊन तो चविष्ट अन्न खातो, छान कपडे घालतो आणि सुंदर वस्तू आणून आपले घर सजवतो. त्या सगळ्यामधून त्याला आनंद प्राप्त होतो. कांही लोकांना व्यसने लागतात, त्यापासूनही त्यांना सुख मिळतच असते, पण नंतर ते त्याच्या आधीन होतात. त्यामुळे ती त्यांची गरज बनते. बहुतेक लोकांना एकच चैन पुनःपुन्हा करावीशी वाटत नाही. ते नवनवे मार्ग शोधत असतात. हे सगळे करून शिल्लक उरलेले पैसे प्रत्येक जण जमवून ठेवतो किंवा त्यातून कसली तरी गुंतवणूक करतो. दागदागिने, घरदार, जमीनजुमला, बँकेतील खाते, शेअर्स वगैरे अनेक प्रकारची त्याची स्थावर आणि जंगम मालमत्ता त्यातून निर्माण होते. ती वाढत असलेली पाहतांना त्याला संतोष होतो. अधून मधून त्याला तीर्थक्षेत्रांची यात्रा करायची इच्छा होते, दानधर्म करावासा वाटतो. त्यातूनही त्याला एक समाधान मिळते. पैसे मिळाले तरी आनंद वाटणे आणि ते खर्च होतांनासुद्धा आनंदच वाटणे हे तार्किक दृष्ट्या विचार केल्यास अगम्य आहे. पण ते तसे होते. यामुळे या सगळ्या प्रकारे होणा-या पैशाच्या विनियोगांचे मूल्य ठरवायचे तरी कसे?

यासाठी सुद्धा वर दिलेले दोन मापदंड उपयोगी पडतात. "या पैशाचे एरवी मी काय केले असते आणि याहून वेगळे काय करू शकलो असतो?" याचा विचार केला तर त्यापासून कोणत्या प्रकारचा आणि केवढा आनंद आपल्या आयुष्यात निर्माण झाला असता याची कल्पना येते. हाच विचार मी केला आणि या सहलीवर जाण्याचा निर्णय घेतला. तो अर्थातच बरोबर ठरला. मला जे पैसे 'बरेचसे' वाटले ते कोणाला 'थोडेसे' वाटतील तर सर्वसामान्य मध्यमवर्गीयाला तेवढे पैसे खर्च करणे अशक्यप्राय वाटू शकेल. ज्याला ते शक्यच नसेल त्याला त्याबद्दल विचार करायचा प्रश्नच येत नाही. ज्याला ते क्षुल्लक वाटतील तोही त्यावर फारसा विचार करणार नाही. ज्या लोकांना ते 'बरेचसे' वाटत असतील तेच त्याचा जमाखर्च मांडून पाहतील. हा एवढा प्रपंच फक्त त्यांच्यासाठीच उपयोगाचा आहे.

आनंदाचे क्षण येतात आणि जातात. त्यांना आपण महसुली उत्पन्न म्हणू. या प्रवासातून आपल्या अनुभवाच्या शिदोरीत थोडी भर पडणार एवढा भांडवली स्वरूपाचा लाभ होता. याव्यतिरिक्त सांगायचे झाल्यास हा ब्लॉग लिहायला मजकूर मिळाला, तो लिहितांना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला वगैरे फायदे सांगता येतील. 'बागबान' या सिनेमातला नायक अमिताभ बच्चन त्याच्या मनातील भावनावेगांना वाट करून देण्यासाठी त्यांचेबद्दल रोजनिशीत लिहून ठेवतो. नंतर तेच लिखाण कोणाला तरी आवडते आणि अमिताभला धनधान्यसमृद्धी, प्रसिद्धी वगैरे देऊन जाते. अशा गोष्टी नाटकसिनेमातच घडतात हे खरे असले तरी कदाचित कोणाला तरी हे वर्णन आवडले तर? कोणी सांगावे?

. . . . . . . . .(समाप्त)

1 comment:

Lee said...

Hallow Mr. Anand

Amhi kadhi uerop la jayachi kalpanahi karu shkat nahi. pan tumachya shabdatun ha anubhav sundar amhala dilat.