Thursday, May 30, 2019

आवारा ते . . . . . Avengers


तारकासुर, नरकासुर, बकासुर, अमकासुर, तमकासुर असा एकादा दैत्य अतीशय बलवान आणि उन्मत्त होतो आणि सज्जन लोकांना पिडायला लागतो, त्यांच्यावर जुलुम जबरदस्ती करायला लागतो. ते बिचारे काही करू शकत नाहीत अशा दयनीय अवस्थेत सापडलेले असतांना एकादी देवता किंवा देव अवतार धारण करतो आणि त्या दुष्टाचा संहार करून गरीब लोकांना त्याच्या तावडीतून सोडवतो. अशा प्रकारच्या अनेक गोष्टींनी आपली पुराणे भरलेली आहेत. रामायण व महाभारत या खंडकाव्य़ांमध्ये दुष्ट आणि सुष्ट प्रवृत्तींचे अधिक सविस्तर वर्णन केले आहे आणि त्यांच्यामधील संघर्षातल्या एकेका प्रसंगाचे तपशीलवार वर्णन केले आहे.

पाश्चात्य पुराणातसुद्धा गोलियाथसारखे राक्षस आहेत आणि अरबी सुरस कथांमध्ये अल्लाउद्दिनचा दुष्ट काका तसेच अलीबाबाच्या गोष्टीतले चाळीस चोर आहेत. ते आधी यशस्वी होत असतात, पण गोष्टींचा शेवट त्यांच्या संहाराने होतो. ख्रिश्चन धर्मात अवतार या कल्पनेला थारा नसल्यामुळे रॉबिनहूडसारख्या वीरांच्या दंतकथा तयार झाल्या. या सगळ्या कथांमधली मुख्य गोष्ट दुष्ट वृत्तीचा पराभव आणि सुष्टांचा विजय इथे संपते कारण लोकांना तसाच शेवट हवा असतो. लोक अशाच गोष्टी  आपल्या मुलांना किंवा शिष्यांना सांगतात आणि ते त्यांच्या मुलांना आणि शिष्यांना सांगतात अशा तीन पिढ्या तर मीच पाहिल्या आहेत. या प्रकारे होत असलेल्या प्रसारातूनच अशा गोष्टी गेली हजारो वर्षे टिकल्या आहेत.

मुद्रणाची सोय नसतांना सगळे हातानेच लिहावे लागत असल्यामुळे पुराणांच्या पोथ्या दुर्मिळ असायच्या. कोणी शास्त्री, पुराणिक त्या वाचून दाखवत असत, तसेच कीर्तन किंवा प्रवचनांमधून गावातल्या लोकांना सांगत असत. ग्रामीण भागात लोकप्रिय असलेले पोवाडे किंवा वग यामधूनसुद्धा अशाच आशयाच्या गोष्टी तिखटमीठ लावून सांगितल्या जात असत आणि तिथे प्रेक्षक त्यांना टाळ्याशिट्यांनी दाद देत असत.

पुस्तकांची छपाई सुरू झाल्यानंतर कथा, कादंबऱ्या, नाटके आदिंमधून नवनव्या गोष्टी लिहून प्रसिद्ध करण्याला बहर आला. मराठी नाट्यसृष्टी निर्माण झाल्यानंतर त्याचच्या सादरीकरणाची नवी सोय झाली. त्यानंतर सिनेमा आला आणि मनोरंजनाचे मुख्य साधन झाला. पुढे टेलिव्हिजन, इंटरनेट वगैरे माध्यमे येत गेली. या सर्व ठिकाणच्या गोष्टींमधला तपशील बदलला तरी सुष्टदुष्ट हा मुळातला गाभा तसाच राहिला. काही ठिकाणी याच्या विपरीत झालेले दाखवले गेले तरी ते लोकांच्या मनाला भावत नाही.

माझ्या लहानपणच्या काळात म्हणजे साठपासष्ठ वर्षांपूर्वी दिलीपकुमार आणि राजकपूर हे नट आघाडीवर होते. त्यातल्या आजाद, गंगाजमुना यासारख्या दिलीपकुमारच्या सिनेमांना उत्तर भारतातल्या ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असायची तर आवारा, श्री ४२०, अनाडी यासारख्या राजकपूरच्या सिनेमातल्या बहुतेच घटना मुंबईतच घडत असत. बदल म्हणून कधी राजकपूरही चंबळच्या खोऱ्यात जाऊन "जिस देश में गंगा बहती है" म्हणायचा किंवा थंड हवेच्या ठिकाणी 'आह' भरायचा तर दिलीपकुमार सुटाबुटात स्मार्टपणे वावरायचा. ते काहीही असले तरी कथानकांमध्ये नायकनायिकांच्या जोडीला खलनायक हवाच. मग तो खेड्यातला जमीनदार, साहूकार किंवा डाकूंचा सरदार असेल किंवा शहरातला दादा, बदमाश, स्मगलर किंवा धनाढ्य व्यापारी, कारखानदार असेल. सुरुवातीपासून पहिल्या नव्वद टक्के भागात खलनायकाची सरशी आणि शेवटी काही चमत्कार होऊन त्याचा पाडाव हा ठरलेला फॉर्म्यूला असायचा.

प्रेक्षकांना काही वेगळी प्रेक्षणीय स्थळे दाखवण्यासाठी गोष्टींमध्ये सिमला, दार्जिलिंग, उटी वगैरे हिल स्टेशन्स किंवा गोवा, केरळ, लक्षद्वीप यासारखे सागरकिनारे आणले गेले. सिनेमा उद्योगाची आर्थिक परिस्थिती जरा बरी झाल्यानंतर थेट काश्मीरची पार्श्वभूमी आणली. त्यात आणखी सुधारणा झाल्यावर स्विट्झर्लंड, पॅरिस, लंडन, टोकियो करत सिनेमा इंटरनॅशनल झाला आणि त्यासोबतच खलनायकांचेसुद्धा प्रमोशन होऊन ते आंतरराष्ट्रीय टोळ्यांचे म्होरके झाले. वेगळ्या जागीही सिनेमातला सुष्टदुष्टांचा संघर्ष राहिलाच.

पण हे फक्त भारतातच होत असते असे नाही. मला जेंव्हापासून इंग्रजी वाचायला यायला लागले त्या काळापासून मी फँटम आणि मँड्रेकच्या कॉमिक्स वाचत आलो आहे. पुढे अॅस्टेरिक्स आणि टिनटिन आवडायला लागले. त्यातच हीमॅन, बॅटमॅन, सुपरमॅन आणिक कोणकोणते मॅन यांचे दौरे आले. या सगळ्या गोष्टींमध्ये 'गुड व्हर्सेस ईव्हिल' याच गाभ्यावर आधारलेल्या निरनिराळ्या गोष्टी असायच्या आणि अखेरीस गुडने बॅडवर मात केली की वाचक खुश ! इंग्रजी सामाजिक सिनेमांच्या गोष्टी त्याच तालावर असायच्या. युद्धपटांमध्ये जर्मनीजपान हे व्हिलन असल्यामुळे ते सगळे वाईट आणि ब्रिटिश अमेरिकन हीरो असे दाखवले जायचे.

युरोपअमेरिकेमधले लोक आपल्या दृष्टीने 'फॉरेन'मधे रहातच असल्यामुळे त्यांना बर्फाचे डोंगर किंवा उंच इमारती, प्रशस्त रस्ते वगैरेंचे काय कौतुक असणार? त्यांच्यासाठी अमेझॉनचे घनदाट जंगल किंवा पॅसिफिक महासागराच्या तळाशी असलेली झुडुपे अशा गोष्टी दाखवल्या गेल्या, पण त्या तरी किती पाहणार? मग त्यांची नजर अवकाशाकडे वळली. परग्रहावरून उडत्या तबकड्यांमधून आलेले माणसांसारखे एलियन्स किंवा विचित्र आकारांचे प्राणी यांच्या फिल्म्स आल्या. जुरासिक पार्कमध्ये लक्षावधी वर्षांपूर्वी नष्ट झालेले अजस्त्र डायनोसॉरस आणि इतर काही सॉरस पुन्हा भूमीवर अवतरले. 

पंचवीस वर्षांपूर्वी आलेली स्टार ट्रेक ही सीरियल चांगली हिट झाली. त्यातले कॅप्टन कर्क, मि.स्पॉक, डॉ.मॅकॉय आणि इतर क्र्यू मेंबर्स स्टारशिप यू एस एस एंटरप्राइज या स्पेसशिपमध्ये बसून निरनिराळ्या ग्रहावरील राक्षसांचे दमन करत असत. त्यांच्याकडे अनेक नवनव्या प्रकारची शस्त्रे असत तसेच हवे तेंव्हा एका ठिकाणी अदृष्य होऊन दुसऱ्याच ठिकाणी जाऊन प्रगट होण्याची कला असायची. या मालिकेत सायन्स फिक्शनचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला.

आल्बर्ट आइनस्टाइनने सापेक्षतावादाचा शोध लावल्यावर त्यातून निघालेल्या निष्कर्षांमधून टाइम मशीनची अफलातून कल्पना निघाली. या मशीनमध्ये बसून नायक, नायिका तसेच खलनायक क्षणार्धात शेकडो वर्षे भविष्यात किंवा भूतकाळात जाऊन वावरायला लागले. मग त्या काळात त्यांनी केलेल्या उचापतींचे वर्तमानकाळात काय परिणाम होतात यावर कल्पनेच्या भराऱ्या मारल्या गेल्या. हेही एक प्रकारचे सायन्स फिक्शन होते.

संगणकक्रांतीमुळे इतर क्षेत्रांप्रमाणेच मनोरंजनाच्या क्षेत्रातही उलथापालथ झाली. पूर्वी निरनिराळ्या पात्रांसाठी चित्रविचित्र पोशाख करावे लागत असत आणि त्याला मर्यादा असायच्या. ट्रिकसीन्ससाठी काही चमत्कार अरेंज करून दाखवावे लागायचे त्यासाठी भरपूर कष्ट करावे लागत असत. आता कॉंप्यूटर ग्राफिक्सच्या सहाय्याने कुठल्याही आकाराचे विचित्र प्राणी आणि पक्षीसुद्धा तयार करून त्यांना वाटेल तसल्या हालचाली करतांना दाखवता येतात.

सुपरमॅन, बॅटमॅन वगैरे हीरो एकएकटे संघर्ष करत असत. मार्वेल कॉमिक्सने अॅव्हेंजर्स नावाची अशा वीरांची टोळीच तयार केली. कॅप्टन अमेरिका, ब्लॅक विडो, हल्क, ठोर, आयर्नमॅन, ब्लॅक नाइट इत्यादी अनेक सुपर हीरोज मिळून अख्ख्या गॅलॅक्सीचे रक्षण करत असतात. मार्वेलने अॅव्हेंजर्सच्या सिनेमांची एक मालिका सुरू केली. मागील महिन्यात रिलीज झालेल्या अॅव्हेंजर्स - दि एंड गेम या सिनेमात सगळा मसाला ठासून भरला होता. निरनिराळ्या उपग्रहांवरील विचित्र आणि भयानक आकारांचे पशुपक्षी, किडेमुंग्या आणि टाइममशीनमधून हवे तेवढे भूतकाळात किंवा भविष्यकाळात जाण्यायेण्याची सोय, अनेक प्रकारची महाभयंकर शस्त्रास्त्रे वगैरेंमुळे त्यात प्रचंड वैविध्य आले आहे, थ्रीडीव्हिजन, सराउंड साउंड वगैरेमुळे ते सगळे चित्तथरारक प्रकार अगदी आपल्या आसपास घडत असल्याचा भास होतो. अशा सगळ्या गुणांनी युक्त असा हा सिनेमा जगातल्या हजारो थेटरांमध्ये एकदम प्रदर्शित झाला आणि तो पाहणाऱ्यांच्या गर्दीचे आणि उत्पन्नाचे जागतिक रेकॉर्ड्स मोडत चालला. पुण्यातल्याच अनेक मॉल्समधील मल्टिस्क्रीन थिएटरमधील सगळे ५-६ पडदे या सिनेमाला दिले होते आणि एरवी दिवसाकाठी होणारे चार पाच खेळसुद्धा हाउसफुल होत असल्याने शनिवार रविवारी आणखी जादा खेळ ठेवले होते.

थॅनोस नावाचा महाविध्वंसक राक्षस अद्भुत शक्तीशाली इन्फिनिटी स्टोन्सच्या सहाय्याने सगळ्या विश्वामधील अर्धी जीवसृष्टी गायब करतो तेंव्हा टोनी स्टार्क, नेब्यूला, बॅनर, स्टीव्ह, ठोर, नताशा, लँग्ज वगैरे अनेक अॅव्हेंजर्स एकत्र येऊन लढा देतात. टाइम मशीनमधून मागे जाऊन ते स्टोन्स काबीज करतात आणि नष्ट झालेल्या जीवांना परत आणतात, पण थॅनोस आपल्या सैन्यानिशी त्यांच्या ग्रहावर हल्ला करतो. त्याच्याशी घनघोर लढाई होते त्यात अनेक उलथापालथी झाल्यानंतर अखेरीला स्टार्क हा अॅव्हेजर त्या स्टोन्सचाच उपयोग करून थॅनोसला नष्ट करतो, पण त्यातून निघालेल्या अपार ऊर्जेमुळे त्याचाही बळी जातो. मात्र बाकीचे विश्व सुरक्षित राहते. अशा प्रकारे शेवट गोड होतो आणि सगळे प्रेक्षक आनंदात घरी जातात.

मी या मालिकेतला हा पहिलाच चित्रपट पाहिला असल्यामुळे अनभिज्ञ होतो, पण मुख्यतः किशोरवयातले आणि युवा प्रेक्षक प्रत्येक अॅव्हेंजर हीरो पडद्यावर दिसला रे दिसला की टाळ्या आणि किंकाळ्यांनी त्याचे स्वागत करत होते आणि त्याने केलेल्या प्रत्येक प्रहारावर गलका करून थिएटर डोक्यावर घेत होते. अशा प्रकारचा प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मी पहिल्यांदाच पहात होतो. मला मात्र मुख्य पात्रेच ओळखीची नसल्यामुळे थेटरमधल्या आरडाओरडीमधूनच आलेले पात्र सुष्ट आहे की दुष्ट आहे त्याचा अंदाज होत होता. मला तर सगळेच अक्राळ विक्राळ दिसत होते किंवा त्यांनी तसले मुखवटे लावले होते. जे त्यातल्या त्यात जास्त भयानक आणि हिडीस आणि कुत्सित किंवा विकराल हास्य करणारे ते दुष्ट राक्षस अशी मी एक खूणगाठ बांधून घेतली होती, पण केंव्हा केंव्हा माझा अंदाज चुकतही होता. मुख्य खलनायकाने कितीही विध्वंस केला तरी शेवटी त्याचा नाश होणारच हा माझा अंदाज मात्र बरोबर ठरला.


Friday, May 17, 2019

स्मृती ठेउनी जाती - भाग १६ - तात्या अभ्यंकर

स्व.तात्या अभ्यंकर यांना त्यांच्या चाहत्यांनी  मनोगत, फेसबुक आणि मिसळपाव या स्थळांवर दिलेल्या श्रद्धांजलींचे एक संकलन इथे वाचा.

तेरा वर्षांपूर्वी रिटायर झाल्यानंतर मला आंतर्जालावर भटकायला भरपूर वेळ मिळायला लागला. त्या काळात मराठीमधून तिथे लिहिण्याची सुरुवातच होत होती. ते पाहून लहानपणापासून माझ्या मनात दडून बसलेली एक ऊर्मी उफाळून आली आणि मी माझा ब्लॉग सुरू केला. पण त्या काळात तो कोणी वाचतात का ते मला समजायला मार्ग नव्हता. कुणालाही मुक्त प्रवेश असलेल्या मनोगत या संकेतस्थळाची माहिती मला काही दिवसांनी मिळाली आणि मी चाचपडतच मनोगतवर प्रवेश केला. इथले सदस्य तिथे आलेले बहुतेक लेखन कसेही असले तरी वाचत असत आणि लगेच त्यावर कॉमेंट्सही देत असत.

तेंव्हा तिथे छोटा डॉन, पिवळा डँबिस, ३.१४विक्षिप्त, चित्त, केशवसुमार, अत्त्यानंद अशांसारखी नावे धारण करणारी दादा मंडळी होती आणि काही लोक आपल्या खऱ्या नावानेही तिथे वावरत असत. त्यांच्याबरोबर एक विसोबा खेचर होता. त्याचे कधी अत्यंत खुसखुशित तर कधी सडेतोड किंवा घणाघाती लिखाण मला खूप आवडायचे. संगीतावर लिहितांना तो खूप समरस होऊन त्यातले बारकावे समजाऊनही सांगत असे. नंतरच्या काळात त्याने रौशनी या नावाची एक दीर्घकथा लिहिली. सुरुवातीच्या काळात मनोगतवर त्याचा रोजचा वावर होता आणि निरनिराळ्या लोकांनी टाकलेल्या पोस्टांवरसुद्धा तो तुफान फटकेबाजी करत असे, कुणाची टोपी उडव, कुणाच्या पंच्याला हात घाल वगैरे त्याचे उद्योग बहुतेक सगळेजण मोकळेपणाने घेत असत कारण त्यात निखळ विनोद असायचा, कुजकटपणा किंवा द्वेश नसायचा. थोड्याच अवधीत मीसुद्धा त्याचा फॅन झालो होतो.

मनोगतवरील लेखांवर होत असलेल्या टोलवाटोलवीचे रूपांतर कधी कधी व्यक्तीगत भांडणांमध्ये व्हायला लागले ते पाहून तत्कालीन संचालकांनी एक प्रकारची सेन्सॉरशिप जाहीर केली. त्यामुळे प्रत्येक लिखाण किंवा त्यावरील टीका, टोमणे वगैरे आधी कुणीतरी नजरेखालून घातल्यानंतर ते प्रकाशित करायचे असे त्याचे स्वरूप झाले. पण स्पॉंटेनियटी हा तर त्या वादविवादांचा जीव होता. ती उत्स्फूर्तता गेली तर ते स्थळ निर्जीव किंवा सपक झाले असते. यावर विचार करण्याच्या निमित्याने विसोबाच्या पुढाकारातूनच एकदा मनोगतचा कट्टा जमवायचे ठरले. (ही गोष्ट मला आता समजली.) मनोगतवर वावर असलेली ही मंडळी आहेत तरी कोण? याची मला उत्सुकता असल्याने मीही त्याला हजेरी लावली.

ठाण्यातल्या एका प्रशस्त घरात आम्ही २०-२५ जण जमलो होतो. तिथे मला कळले की या अवलियाचे खरे नाव तात्या अभ्यंकर असे आहे. गोरा गोमटा, अंगाने स्थूल, चेहऱ्यावर बेदरकारीचा आणि तितकाच आपुलकीचा भाव, मनमोकळे अघळपघळ बोलणे वगैरेंनी युक्त अशा तात्याचे माझ्यावर पहिले इंप्रेशन चांगले पडले. आम्हा दोघांच्या वयात २०-२५ वर्षांचा फरक असला तरी आमचे बरे सूत जमले. तात्या तर त्या कट्ट्याचा संयोजक, सूत्रसंचालक आणि प्रमुख पाहुणा वगैरे सबकुछ होता. त्याने आपुलकीने सर्वांची चांगली आवभरत केली, आपल्या विनोदी बोलण्यामधून थट्टामस्करी करत सर्वांना हसत खेळत ठेवलेच, थोडी तात्विक चर्चाही केली आणि थोडा बिहाग रागही गाऊन दाखवला. सगळ्या अनोळखी लोकांनी जमवलेला तो कट्टा म्हणजे माझ्यासाठी एक विलक्षण आणि संस्मरणीय असा अनुभव होता. तिथे मला पहिल्यांदा भेटलेले काही सदस्य माझे जन्मभराचे मित्र झाले.

तात्याचे बिंधास वागणे किंवा बेछूट लेखन कदाचित मनोगतमधल्या काही विद्वानांना मानवत नसेल आणि त्यांनी ढवळाढवळ केलेली तात्याला चालत नसेल. यावर उपाय म्हणून तात्याने स्वतःचे मिसळपाव हे नवे संकेतस्थळ काढले आणि त्याच्याच शब्दातले त्याचे हे 'हॉटेल' उत्तम प्रकारे चालवले. तिथली सदस्यसंख्या आणि तिथे येणाऱ्या लेखांची संख्या भराभर वाढत गेली. मनोगतवरील तात्याचे अनेक मित्र तिथे रोजच्या रोज काहीबाही लिहीत होतेच, इतरही अनेक नवे सदस्य तिकडे आकर्षिले गेले आणि ज्ञान व मनोरंजन यांचा एक खजिनाच मराठी वाचकांना उपलब्ध झाला. या अजब प्रकारच्या हॉटेलातले काम कसे चालत असे यावर मी दहा वर्षांपूर्वी लिहिलेला एक हलका फुलका लेख खाली दिला आहे.

काही वर्षांनंतर तात्याने बहुधा मिसळपावमधूनही आपले अंग काढून घेतले आणि फेसबुकवर शिळोप्याची ओसरी काढली आणि तीही छान चालवली. तिथेही रोजच त्याचे स्वतःचे आणि इतर मित्रांचे मजेदार लेखन वाचायला मिळत असे. माझी जुनी ओळख लक्षात ठेऊन त्याने या दोन्ही ठिकाणी मला पाचारण केले होते आणि मीसुद्धा तो माझा बहुमान समजून अधून मधून दोन्हीकडे चकरा मारून येत होतो. अलीकडच्या काळात वॉट्सॅप आल्यानंतर बेसुमार वाढलेल्या माझ्या इतर व्यापांमुळे मी अलीकडे तिकडे फारसा जाऊ शकत नव्हतो. तात्यासुद्धा काही वेळा कित्येक दिवस अदृष्य होत असे. त्यामुळे अलीकडल्या काळात माझी त्याच्याशी आंतर्जालावर गाठ पडली नव्हती आणि आज अचानक त्याच्या अकाली निधनाची धक्कादायक बातमी आली. ईश्वर त्याच्या आत्म्याला सद्गति देवो अशी प्रार्थना.

तात्याच्या व्यक्तीगत जीवनाविषयी मला काहीच माहिती नव्हती. मी त्याला पहिल्यांदा भेटलो तेंव्हा तो कसला तरी व्यवसाय करतो एवढेच समजले होते. त्याचा परिस्थिती खाऊन पिऊन सुखी अशी दिसत होती. तो आपल्या लेखांमध्ये स्वतःबद्दल काहीबाही लिहायचा, पण त्यातले किती खरे मानायचे आणि किती काल्पनिक ते समजायला मार्ग नव्हता. तो गेल्यानंतर त्याला दिल्या गेलेल्या श्रद्धांजलींमधून मला माहीत नसलेली बरीच नकारात्मक माहिती पुढे आली. त्याच्या कुठल्याशा व्यवसायामध्ये त्याला मोठी खोट बसल्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती असे वाटते. तो इतके छान लिहीत असे, पण या उपजत प्रतिभेमधून त्याला कधीच खूप पैसे मिळवता आले नाहीत. त्याने दिवसातला बराच वेळ लेखनामध्ये खर्ची घातला, पण त्यातून कमाई करायचा प्रयत्नच केला नाही की आज घडीला त्याला सोयिस्कर मार्केट नाही कोण जाणे! पुस्तके लिहून प्रकाशित करणे किंवा कथा, पटकथा, संवाद वगैरे लिहिणे अशा गोष्टी तो छानपणे करू शकला असता असे मला तरी वाटते. तो एक उत्तम गायक होता, त्याचे मोठमोठ्या संगीतकारांशी किती चांगले संबंध होते ते तो फोटोंसह आपल्या लेखांमध्ये सांगत असे. पण त्याने या कलागुणाचाही व्यवसाय केला नसावा.  "गंधर्वांना शाप असतात म्हणे" असे पु.ल.देशपांड्यांनी नंदा प्रधान या पात्राबद्दल लिहितांना  लिहिले आहे. तात्या अभ्यंकरच्या जीवनाकडे पाहतांना तोसुद्धा एक असाच शापित गंधर्व असावा असे मला वाटले.

ठाण्यातल्या कट्ट्यात झालेल्या ओळखभेटीनंतर पुन्हा कधी आमची गाठभेट झाल्याचे आठवत नाही कारण आमची विश्वे संपूर्णपणे वेगवेगळी होती. त्यात आम्हाला एकत्र येण्याचे काही प्रयोजन किंवा कारण नव्हते. तसा योगायोगही आला नाही. पण मनोगत, मिसळपाव आणि शिळोप्याची ओसरी या स्थळांवर अधूनमधून माझे जाणे होत असल्यामुळे त्याचे प्रखर तसेच खेळकर अस्तित्व मात्र सतत जाणवत राहिले. आता ते सगळे संपले, पण त्याच्या स्मृती मनाच्या एकाद्या कोपऱ्यात नेहमी राहणार आहेत.
-----------------------------------------------------



आपले लाडके श्री.तात्या अभ्यंकर आज आपल्यात राहिले नाहीत. त्यांच्या मिसळपाव या संकेतस्थळाबद्दल मी दहा वर्षांपूर्वी लिहिलेला एक लेख त्यांच्या स्मरणार्थ खाली देत आहे. जे वाचक जुने मिपाकर असतील तर त्यांना ते कदचित दिवस आठवत असतील.
.... आनंद घारे


मिसळपाववरील पहिले वर्ष


एक वर्षापूर्वी मी मिसळपावच्या हॉटेलात पहिले पाऊल ठेवले. ते कोण चालवत असे याची त्या वेळी मला कांही कल्पना नव्हती. पण आंत आल्या आल्या तात्यासाहेबांनी जुनी ओळख दाखवून मोठ्या अगत्याने "या, बसा." असे म्हणत माझ्याकडे खुर्ची सरकवली. आजूबाजूला बसलेल्या लोकांत कांही ओळखीचे चेहेरे आणि मुखवटे पाहून मलाही आपल्या माणसांत आल्यासारखे वाटले. काउंटरवर जाऊन मी थाळी भरून घेतली. जेवण तर मस्तच होते. तेंव्हापासून मी इकडे येत राहिलो. मधील काळात कधी मला तर कधी माझ्या संगणकाला विषाणूंची बाधा झाली, कधी मी परगांवी गेलो वगैरे कारणांमुळे मला अवकाशाशी जडलेले नाते राखता आले नाही. ते पुन्हा जुळेपर्यंत पोस्टाच्या पेटीत पत्रांचा ढिगारा सांचलेला असायचा. माझ्या ढाब्यावरसुध्दा पूर्वी चार माणसे यायची, त्यांची संख्या आता पांच सहा (आंकड्या)वर गेली आहे. त्यांना काय हवे नको ते पहायचे असते. त्या व्यापातून वेळ काढून अगदी रोजच्या रोज मिसळपाववर यायला जमले नाही आणि त्यामुळे कांही छान पदार्थांची ताजी चव घेता आली नाही. पण आपल्याला जे मिळाले नाही त्याची खंत करण्यापेक्षा जे मिळाले त्याची कदर करावी, असे मी नेहमीच स्वतःला आणि कधी एकादा ऐकणारा भेटला तर त्याला सांगत असतो.

"तुम्हाला वाचनातून काय मिळतं हो?" असा प्रश्न आपण दहा लोकांना विचारला तर त्याची निदान वीस तरी उत्तरे मिळतील, पण त्या सर्वांची गोळाबेरीज बहुधा माहिती आणि मनोरंजन यात होईल. पुढे त्यामुळे निरनिराळ्या क्षेत्रात उन्नती झाली, अनेक प्रकारचा आनंद मिळाला वगैरे त्याचे कित्येक फायदे त्यातून निघतील. मी मात्र एकादी गोष्ट समजून घेत असतांना त्या क्रियेत तल्लीन होऊन जातो आणि देहभान हरपवून टाकणारा एकादा कलाविष्कार पहात किंवा ऐकत असतांनासुध्दा त्यातून कसला तरी शोध बोध मनातल्या मनात चाललेला असतो. माहिती आणि मनोरंजन या गोष्टी मला एकमेकींपासून वेगळ्या करता येत नाहीत. मिसळपाववर मला त्या दोन्हीही मिळाल्या असे सांगता येईल.

मिपावरच्या मेनूकार्डात कांही मुख्य विभाग आहेत. त्यातल्या प्रत्येक पदार्थाला लेखनविषय आणि लेखनप्रकार यांची लेबले लावावी लागतात. अशा चौकटी आंखून त्यात बसतील असे शब्द लिहायला मला जमत नाही. तापलेल्या तव्यावर फोडून टाकलेल्या अंड्याप्रमाणे माझे लिखाण अस्ताव्यस्त पसरत जाते. त्यामुळे मुळात मला लिहायला तरी कुठे येते? असा प्रश्न कांही लोक विचारतात, तसा तो मलाही पडतो. पण मी त्याला नजरेआड खुंटीला टांगून ठेवतो आणि सुचेल तसे कीबोर्डवर बडवून घेतो. अर्थातच इतर लोकांच्या लेखनाच्या लेबलांकडे माझे लक्ष जात नाही. मी सरळ खाली लिहिलेले वाचायला सुरुवात करून देतो.

मिपाच्या सर्व विभागात 'जनातलं, मनातलं' हे माझे मुख्य खाद्य आहे. अनेक छान छान कथा, अनुभव, प्रवासवर्णने, व्यक्तीचित्रे वगैरे मला त्या विभागात वाचायला मिळाली. कांही कथा काळजाला भिडणार्‍या होत्या तर कांही गुदगुल्या करणार्‍या, कांही क्षणाक्षणाला रहस्य वाढवत नेणार्‍या तर कांही शेवटच्या एका वाक्यातच दणका देणार्‍या अशा नाना तर्‍हा त्यात होत्या. कधी कधी कल्पितापेक्षा वास्तव जास्त अद्भुत किंवा भयानक असते याचे अनुभव कोणी लिहिले, तर कोणी आपले मजेदार किस्से सांगितले. कोणी गौरवशाली भूतकाळातली एकादी गोष्ट सांगितली तर कोणी नजिकच्या भविष्यकाळात काय घडू शकते याचा अंदाज वर्तवला. वर्तमानकाळात घडत असलेल्या घटनांवरील लेखांचा प्रवाह तर धोधो वहात असतो. वर्तमानपत्रात छापून येण्यापूर्वीच एकादी महत्वाची बातमी मला मिपावर वाचायला मिळाली असेही अनेक वेळा घडले, इतके इथले सदस्य सजग आणि तत्पर आहेत. समुद्रकिनारा ते बर्फाच्छादित पर्वतशिखरे, प्राचीन वाडे ते आलीशान पॅलेसेस, तसेच मंदिरे, चर्च, म्यूजियम वगैरे कांही निसर्गसौंदर्याने नटलेल्या तर कांही मानवाची किमया दाखवणार्‍या अशा अनेक स्थळांची सचित्र वर्णने वाचायला आणि पहायला मिळाली. कांही लेखातून मधुर गायनाचे दुवे मिळाले. अशा प्रकारे हे सदर वाचणे ही एक मेजवानी असायची. कांही चित्रकारांच्या कुंचल्यातील अप्रतिम जादू आणि छायाचित्रकारांच्या कौशल्याची कमाल वेगळ्या कलादालनात पहायला मिळाली.

काथ्याकूट या सदरात होणार्‍या चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी संयोजकांची इच्छा आहे! त्यानुसार कधी कधी एकाद्या विषयावर मुद्देसूद चर्चा घडते. त्यातून त्या विषयाचे आपल्याला आधी माहीत नसलेले पैलू समोर येतात. "वादे वादे जायते तत्वबोधः।" या उक्तीनुसार आपल्या मनातल्या कांही अस्पष्ट संकल्पनांना आकार येतात, त्याचे रेखाचित्र असेल तर त्यात रंग भरले जातात, चित्र असेल तर त्याला उठाव येतो. पण कांही वेळा मुळात टाकलेल्या काथ्याकडे दुर्लक्ष होते आणि लोक आपापल्या सुतळ्या, दोरखंड, काड्या वगैरे त्यात घालून कुटत बसतात. अशा काथ्याकुटासाठी काथ्यांचे वेगवेगळे धागे न टाकता एक खलबत्ताउखळमुसळ यंत्र अखंड चालत ठेवले आणि ज्यांना जे पाहिजे ते जितके हवे तितके बारीक किंवा भरड कुटू दिले तरी फारसा फरक पडणार नाही. मात्र त्याचा खाट सहन होत नसेल तर हातातला उंदीर तिकडे जाण्यासाठी चुळबुळ करायला लागला की आधी कीबोर्डाचे कनेक्शन काढून ठेवणे बरे असते अशी सावधगिरी बाळगण्याची सूचना करावी असे वाटते.

आजची खादाडी हा तर मिसळपावचा लाडका विषय असायलाच पाहिजे. मुखपृष्ठावरच मुळी इतके छान छान फोटो टाकलेले असतात की ते पाहतांना तोंडाला पाणी सुटते. इतर विभागातले लाक्षणिक अर्थाने 'पदार्थ' वाचून मन तृप्त होते, पण पाककृती मात्र प्रत्यक्ष करून आणि जिभेने चाखून पहाव्याशा वाटतात. आमच्या किचनलँडचा फक्त टूरिस्ट व्हिसा मला मिळालेला असल्यामुळे तिथे गेल्यावर लुडबूड करता येत नाही. शिवाय गोड, तिखट, खारट, आंबट, तेलकट, तुपकट वगैरे सगळ्या चविष्ट पदार्थांच्या आणि उत्तेजक पेयांच्या सेवनावर नतद्रष्ट डॉक्टरांनी नियंत्रण घालून ठेवले आहे. इंटरनेटमधून जशी छान चित्रे पहायला मिळतात, सुरेल संगीत ऐकायला मिळते त्याचप्रमणे खाद्यपदार्थ तयार होतांना पसरणारा घमघमाट आणि तयार झाल्यावर त्याला आलेली चव यांचा आस्वाद दुरून घेता येण्याची सोय कधी तरी होईल असे मनातले मांडे मी मनात खात असतो.

"जे न देखे रवी ते देखे कवी" असे म्हणतात. त्याप्रमाणे जिथे सूर्याचा प्रवेश होत नाही अशा आभाळात हे महानुभाव आपल्या कल्पकतेचे पंख लावून स्वैर भ्रमण करत असतात. त्यांचे शेपूट धरून त्यांच्याबरोबर जायला मिळाले तर आपल्याला सुध्दा त्याचे नेत्रदीपक दर्शन घडू शकते. पण कधी कधी जे कवीला दिसते ते पाहण्याइतकी क्षमता आपल्या दृष्टीत नसते किंवा आपल्या पंखातले बळ कमी पडते आणि आपण जमीनीवरच खुरडत राहतो. कधी तर आपण त्यांच्या सोबतीने आकाशात उडण्याऐवजी पार पाताळात जाऊन पोचलो आणि कवीला न दिसलेले आपल्याला दिसायला लागले तर पंचाईत होते. अशा अमूर्त अगम्य गोष्टींविषयी मला फारसे आकर्षण वाटत नसल्यामुळे त्या प्रांतात मी क्वचितच जातो. त्यातला विडंबन हा प्रकार समजायला सोपा आणि मजेदार वाटतो. मूळ कविता आपल्या ओळखीची असेल, त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे विडंबन करणार्‍याला ती पूर्ण समजली असेल, त्यातले वृत्त, छंद वगैरे व्यवस्थितपणे सांभाळले गेले असेल आणि मूळ कवितेची आठवण करून देणारे महत्वाचे शब्द किंवा ते ध्वनित करणारे तत्सम शब्द वारंवार येत राहिले तर ते विडंबन मस्त वाटते. नुसतेच एका गाण्याच्या चालीवर दुसरे गाणे रचले तर ते विडंबन न वाटता एक स्वतंत्र काव्य होते आणि त्यातल्या काव्यगुणांप्रमाणे त्याचे मूल्यमापन होते.

प्रत्यक्षातील बहुतेक हॉटेलांत ग्राहकांनी मागवलेले पदार्थ वेटर आणून देतो तर बर्‍याचशा कँटीन, कॅफेटेरिया वगैरेंमध्ये स्वयंसेवा असते. मिसळपावच्या हॉटेलात वाढपी तर नाहीतच, स्वैपाकीसुध्दा नाहीत. एक अद्ययावत साधनांनी युक्त असे स्वयंपाकघर आहे. इथे येणारे ग्राहकच आपापला शिधा घेऊन येतात, वाटल्यास इतर ग्राहकांकडून कांही वस्तू मागून घेतात किंवा ढापतात आणि पाकसिध्दी करून पदार्थ तयार झाल्यावर ते काउंटरवर आणून ठेवतात. इतर सदस्य आणि पाहुणे त्याचा मुक्तपणे आस्वाद घेतात. कांही ग्राहकांचे इतरांवर बारीक लक्ष असते आणि ते त्यांना परोपरीने मदत करत असतात. माझ्यासारख्या नवशिक्याने केलेला पदार्थ धांदरटपणामुळे अर्धाकच्चा राहिला तर तो खरपूस भाजून देतात, त्यात ढेकळे राहिली तर ती फोडून त्यांचा चकणाचूर करतात, दिव्यदृष्टी प्राप्त झालेल्या कांही एक्स्पर्ट लोकांना चुकून आलेले खडे आणि न शिजलेले गणंग पटकन दिसतात, कांही सज्जन खोवलेला नारळ, चिरलेली कोथिंबीर, बारीक शेव वगैरे त्यावर पसरतात आणि बाजूला लिंबाची फोड, टोमॅटोचे काप वगैरे ठेऊन छान सजवून देतात. इथली संचालक मंडळीसुध्दा जसा पदार्थ असेल त्याप्रमाणे त्यावर खमंग फोडणी देऊन, तुपाची धार धरून किंवा पिठीसाखर पसरून त्याची गोडी वाढवतात. अधून मधून ते ग्राहकाचा वेष धारण करून येतात आणि ठेवणीतले चमचमीत पदार्थ तयार करून हॉटेलाचे स्टँडर्ड उंचावतात.

चितळे बंधूंची आंबा बर्फी किंवा बाकरवडी, हलदीरामची सोनपापडी, आलू भुजिया यासारखे सुप्रसिध्द खाद्यपदार्थ किंवा घरी भेट म्हणून आलेले मिठाईचे पुडे इकडे घेऊन यावे असेही कोणाला वाटते. कांही लोक दुसर्‍या चांगल्या हॉटेलातून तिथल्या खाद्यपदार्थांचे पार्सल बांधून आणण्याचा विचार करतात. हे सारे पदार्थ चविष्ट असले तरी मिपाच्या योग्य अशा धोरणाप्रमाणे बाहेरचे खाद्यपदार्थ इथे आणणे वर्ज्य आहे. तसा रीतसर बोर्डसुध्दा लावलेला आहे. पण उत्साहाच्या भरात तिकडे लक्ष न गेल्यामुळे किंवा ते न दिल्यामुळे क्वचित कांही लोक तसे करतात. ते उघडकीला आल्यावर कांही लोक सौम्य शब्दात त्याची जाणीव करून देतात, तर कांही लोक "परवा आम्हाला नाही म्हंटलं होते, आज यांनी केलेलं कसं चालतं ?" वगैरे अवघड प्रश्न विचारून त्यावर वाद घालतात. माझ्यासारखे कांही सदस्य आपापले वेगळे ठेलेसुद्धा चालवतात. त्यात एकादा चांगला पदार्थ बनून गेला तर त्याची चव इतर लोकांनी चाखून पहावी यासाठी कधी कधी ते सदस्य तो पदार्थ  इथे तसेच दुसर्‍या कांही ठिकाणीसुध्दा मांडतात. स्वतः तयार केलेला पदार्थ इथे आणून मांडायला इथल्या नियमांप्रमाणे परवानगी आहे आणि मला त्यात कांही गैर वाटत नाही. पण "आपले उष्टे खरकटे पदार्थ इथे आणून ठेवायला या लोकांना लाजा कशा वाटत नाहीत ?" असा ओरडा जेंव्हा आंतल्या गोटातून एकदा झाला तेंव्हा मात्र मी चपापलो. त्यानंतर त्याचा ऑफीशिअली खुलासा झाला असला तरी त्यावरून समजायचे ते समजून घेऊन मी आपल्यापुरता एक निर्णय मनाशी घेतला होता. पण ती कांही भीष्मप्रतिज्ञा नव्हती की ते जाहीर आश्वासन नव्हते, त्यामुळे नंतर ते विसरून गेलो. आज सिंहावलोकन करतांना त्याची आठवण झाली. हा लेख मात्र खास मिसळपावासाठीच लिहिला गेला आहे याची ग्वाही द्यायला हरकत नाही.

बहुतेक उडप्यांच्या हॉटेलात दारापाशीच एका चांदीच्या चकाकणार्‍या देव्हार्‍यात एक सुंदर मूर्ती ठेवलेली असते किंवा एका स्वामीचा फोटो लावून त्याला ताज्या फुलांचा हार भक्तीभावाने घातलेला दिसतो. मिसळपावच्या मुखपृष्ठावर सुध्दा आराध्य दैवतांची किंवा साधुसंतांची सुंदर चित्रे लावून ते मंगलमय केलेले असते. पण मधूनच कोणी भाबडा (वाटणारा) भक्त एका जगद्वंद्य महात्म्याचा फोटो एका भिंतीला चिकटवून त्याला उदबत्ती ओवाळतो. त्यानंतर दोघेतीघे येतात आणि हिरव्या मिरचीची चटणी, चिंचेचा घोळ, हॉट अँड सॉवर सॉस वगैरेमध्ये बुडवलेली बोटे त्या चित्राला पुसतात. ते पहायलाही कांही लोकांना मजा वाटते. "पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना" असे म्हणतात ना!

मिसळपावाच्या हॉटेलातल्या ग्राहकांना एकेक खण देऊन ठेवले आहेत. एकादा खास पदार्थ करून त्यातल्या कोणाच्याही खणात ठेवलेल्या बशीत घालायची सोय केलेली आहे. कांही ग्राहक त्याचा फायदा रोज घेत असतात. मध्यंतरी एकदा एका सदस्याने भरून ठेवलेल्या अमृतकुंभाचे रेखाचित्र दुसर्‍या एका ग्राहकाने त्याला न विचारता काढले, त्यातल्या अ या अक्षरावर फुली मारली आणि त्याच्या चारी बाजूंना काळ्या रंगाची चौकट काढून ते चित्र आपल्या खणात लावून ठेवले. ते पाहून पहिल्या सदस्याच्या अंगाचा तिळपापड झाला आणि या दोन सदस्यात कांही तिखट व कडू पदार्थांची देवाणघेवाण झाली म्हणे. त्याची कुणकुण कानावर आल्यामुळे अशा प्रकारच्या समांतर चर्चा इथे चालतात हे मला समजले. आपल्या बशीत पडलेले पण न आवडलेले पदार्थ काढून कचर्‍याच्या पेटीत टाकायची सोय आहे. "आज आपण आपली बशी साफ केलीत कां?" अशी आठवण एक सन्मान्य सदस्य सर्वांना रोज करून देत असतो. काउंटरवर ठेवलेले सगळे सुग्रास पदार्थ घ्यायलाच मला वेळ पुरत नाही. त्यामुळे इतर कोणाचे बंद खण उघडून त्यातल्या बशांत काय पडले आहे हे पहाण्याचा प्रयत्न मी कधी करत नाही.

जिवश्चकंठश्च मैत्री असलेले कांही ग्राहक एकमेकांना भेटण्यासाठी या हॉटेलात नेहमी येतात. अर्थातच त्यांच्या गप्पागोष्टी, थट्टामस्करी, उखाळ्यापाखाळ्या वगैरे मस्त रंगतात. या गुजगोष्टी आपापसात करण्यासाठी स्पेशल फॅमिली रूम नसल्यामुळे ते सर्वांसमक्षच चालते. जुन्या काळातल्या इंग्रजी किंवा हिंदी सिनेमातला एक सीन ते पाहतांना माझ्या डोळ्यासमोर येतो. एक जंगी पार्टी चाललेली असते, सारी माणसे छान छान पोशाख करून तिथे आलेली असतात, अचानक त्यातला एकजण हातातला केक दुसर्‍याच्या तोंडावर मारतो, ते पाहून तिसरा चौथ्याकडे फेकतो, पण तो हा हल्ला चुकवतो त्यामुळे तो पांचव्याला लागतो. त्यानंतर सहावा, सातवा, आठवा असे करत पार्टीतले सारेच लोक या खेळात सामील होतात. मधूनच एकादा चार्ली चॅपलिन किंवा राजेंद्रनाथ गालाला लागलेले क्रीम बोटांनी पुसून चाटून घेतो. ते दृष्य पाहतांना सर्व प्रेक्षकांची हंसून हंसून मुरकुंडी वळते.

अशा अनेक गंमतीजंमती मिपावर चाललेल्या असतात. तिथे आज आलेला लेख उद्या इतिहासकाळात जातो आणि परवा तो मुद्दाम शोधून काढावा लागतो इतक्या प्रचंड गतीने ते येत असतात. त्यातले सारेच वाचणे जमत नाही. पण आपल्या आवडीनुसार हवे ते निवडता येते. एकंदरीत पाहता मला हे स्थळ आवडले, शक्य तितक्या वेळा इथे यावे असे वाटले आणि पुढेसुध्दा मी इथे येत रहाणारच आहे असे म्हणतो.

- आनंद घारे

Thursday, May 02, 2019

मराठीतली विरामचिन्हे (. , ? ! ' ")



माझे शिक्षण मराठी माध्यमात झाले. अर्थातच मी आधी मराठी भाषा शिकलो. मला मराठीमधली अक्षरे, शब्द, वाक्यरचना, विरामचिन्हे वगैरे समजायला लागली आणि मी त्या भाषेतील पुस्तके वाचायला लागलो. त्यानंतर अनेक वर्षांनी मी मराठीमधून इंग्रजी शिकलो आणि त्या भाषेतले वाचन आणि लेखन सुरू केले. या दोन्ही भाषांच्या लिपी अगदी भिन्न आहेत. मराठीमध्ये कखगघ या सारखी अनेक व्यंजने आहेत आणि त्यांना काना, मात्रा आणि वेलांट्या लावून बाराखड्या केल्या असल्याने अक्षरशः शेकडो निरनिराळी अक्षरे आहेत, त्याशिवाय जोडाक्षरे निराळीच. इंग्रजीत फक्त २६ अक्षरे आहेत आणि स्पेलिंग हा एक वेगळा प्रकार आहे. असे असले तरी पूर्णविराम (.), स्वल्पविराम,(,) प्रश्नचिन्ह (?), उद्गारवाचक चिन्ह (!), कंस () वगैरेंसाठी मात्र तीच चिन्हे कां असतात या एका गोष्टीचे मला आश्चर्य वाटायचे. इतकेच नव्हे तर ती इंग्रजांनी आपल्याकडून उचलली असतील का असेही वाटायचे.

मराठी भाषेचा इतिहास पहायला गेला तर तो अनेक शतकांचा आहे आणि संस्कृत भाषेपासून सुरुवात करायची झाली तर तो हजारो वर्षांचा म्हणावा लागेल. शिलालेख, ताम्रपट, भूर्जपत्रे, खलिते, बखरी वगैरेंमधून इतिहासाबद्दल माहिती मिळते. पण मी पुराणवस्तूसंग्रहालयांमध्ये किंवा पुरातन देवळे, किल्ले वगैरे जागी असले जितके अवशेष पाहिले त्यातून मला तरी काही बोध झाला नाही. एक तर ती लिपीच माझ्या ओळखीची नसायची, असलीच तरी त्यातले सगळे शब्द सलग लिहिलेले असायचे, त्यातून ते वेगळे करून काढले तरी ते अनोळखी असायचे आणि एकादा ओळखीचा शब्द मिळाला तरी त्याचा संदर्भ लागायचा नाही. म्हणजे माझ्या अक्कलखात्यात काहीही भर पडायची नाहीच. माझ्या लहानपणी आमच्या घरी काही जुन्यापुराण्या जीर्ण जर्जर पोथ्या होत्या. त्यांची सगळी पाने सुटी असायची आणि दोन चपट्या लाकडी फळ्यांमध्ये ठेवलेली असायची. आजोबा, पणजोबांच्या काळातले काही दस्तऐवज होते ते मोडी लिपीत होते. मी त्या पोथ्या एक एक अक्षर करून आईला वाचून दाखवत असे आणि हळू हळू मलाही त्या थोड्या समजायला लागल्या होत्या. जुन्या काळातल्या मोडी दस्तऐवजाला हात लावायला मुलांना परवानगी नव्हती.

या सगळ्या जुन्या काळातल्या मराठी लेखनामधून मला एक गोष्ट दिसली की यात कुठेही विरामचिन्हे नसायची. सगळे संतवाङमय तर पद्य रूपातच होते. त्यात प्रत्येक चरणाच्या शेवटी एक दंड किंवा उभी रेघ आणि श्लोक किंवा ओवीच्या अखेरीला दोन उभ्या रेघा मारून त्यांना वेगळे करत असत. पण पद्यातली वाक्यरचना कर्ता, कर्म, क्रियापद या क्रमानुसार असण्याची गरज नसते. त्यामुळे मराठी गद्य ज्या स्वरूपात वाचण्याची आपल्याला संवय आहे किंवा ज्या स्वरूपात हा लेख लिहिला आहे अशा प्रकारचे लेखन इतिहासकाळात होत नसावे. त्या काळातल्या लेखनाचे काही नमूने वरील चित्रात दिले आहेत. यातले हजार बाराशे वर्षे जुने शिलालेख वाचून ते मराठी भाषेतलेच आहेत असे ठामपणे सांगू शकणाऱ्या पंडितांचे मला प्रचंड कौतुक वाटत आले आहे. 

आपल्या ओळखीची मराठी भाषासुद्धा निदान दीडशे वर्षे तरी जुनी आहेच कारण टिळक - आगरकर यांचे लेख किंवा देवल - किर्लोस्कर यांची नाटके या स्वरूपात आहेत. मग हे प्रत्येक शब्द सुटा लिहिलेले आणि विरामचिन्हांनी युक्त असलेले मराठी भाषेतले लेखन कधीपासून सुरू झाले असेल? पूर्वीच्या काळी अशा प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी खास वाचनालयांमध्ये जाऊन विशिष्ट पुस्तके धुंडाळावी लागायची आणि हे माझ्यासाठी शक्यच नव्हते. पण आता गगलबुवांच्या कृपेमुळे कसलीही पायपीट न करता घरबसल्या बरीच माहिती अगदी सहजपणे आणि फुकटात उपलब्ध होते.  त्यावरून माहिती घेता समजले की या बाबतीतसुद्धा आपल्याला इंग्रज साहेबांचे आभार मानायला हवेत.

आपल्याकडल्या पेशवाईचा ऱ्हास चालू असतांनाच इंग्रजांनी मुंबईला आपले ठाणे वसवले होते आणि इथला प्रदेश गिळंकृत करायचा उद्योग सुरू केला होता. त्या काळात भारतात पाठवल्या जाणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांना इंग्लंडमध्येच मराठी भाषेचे धडे देऊन पाठवत असत. त्यांच्यातल्या मोल्सवर्थ, कँडी आदि काही लोकांना मराठी भाषेची गोडी लागली आणि त्यांनी या भाषेतला शब्दकोष, व्याकरण इत्यादींवर मन लावून आणि कंबर कसून काम केले. त्यांनीच युरोपियन भाषांमध्ये प्रचलित असलेली विरामचिन्हे मराठीत वापरायची पहिल्यांदा सुरुवात केली आणि तशा प्रकारे काही पुस्तके लिहिली. यामागे मराठीभाषिक लोकांना इंग्रजी शिकवून आपल्या बाजूला वळवणे आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे ही त्यांची उद्दिष्टे असली तरी त्यांच्या प्रयत्नांमुळे गद्य मराठी लेखनाला एक नवे स्वरूप प्राप्त झाले. छापखाने सुरू झाल्यामुळे त्याचा प्रसार झपाट्याने होण्याला मदत झाली. त्याच काळात होऊन गेलेले दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी या इंग्रजांच्या कल्पना उचलून घेऊन आणि त्यांचा उपयोग करून घेऊन मराठी भाषेतले व्याकरण लिहिले आणि गद्य लेखन अशा प्रकारे लिहिण्याचा जो पायंडा पडला तो आपण दीडशे वर्षे पाळत आलो आहोत. स्वातंत्र्यानंतर सरकारी प्रयत्नामधून काही समित्या स्थापन झाल्या आणि त्या मराठी भाषेच्या वापराबद्दल काही सूचना देत असतात पण त्याच्या स्वरूपात मूलभूत बदल होण्याची शक्यता मला तरी दिसत नाही. किंबहुना तसे करण्याचे काही कारणही नाही.

Friday, April 26, 2019

विजेच्या बॅटरीचा शोध लावणारा शास्त्रज्ञ व्होल्टा



विजेचा टॉर्च, मोबाइल फोन, मोटारगाडी वगैरेंसाठी आपण बॅटरी वापरतो ती अमूक इतक्या व्होल्टची असावी लागते. घरातल्या किंवा कारखान्यातल्या विजेच्या व्होल्टेजचा उल्लेख आपल्या बोलण्यात किंवा वाचनात येतो. हा व्होल्ट हा शब्द कुठून आला याचे कदाचित कुतुहल असेल. ते एका जुन्या काळातल्या युरोपियन शास्त्रज्ञाने नाव आहे.

आकाशात चमकणारी वीज माणसाला अनादि काळापासून माहीत होती. विल्यम गिल्बर्ट या सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या ब्रिटिश शास्त्रज्ञाने अँबरचा खडा चामड्यावर घासून प्रथमच स्थितिक विद्युत (Static Electricity) तयार केली. या प्रकाराला इलेक्ट्रिक असे नाव त्यानेच दिले. निरनिराळे विशिष्ट पदार्थ एकमेकांवर घासल्यामुळे त्यांच्यात धन किंवा ऋण विद्युत प्रभार (Positive or Negatve Electric Charge) तयार होतात. पण या विद्युत प्रभाराने फार फार तर एकादे हलके पीस किंवा हातावरले केस किंचित हलवले जातील इतके ते क्षीण असतात. तसल्या त्या सौम्य विजेचा कशासाठीही उपयोग होत नव्हता किंवा तिच्यामुळे कुणालाही त्रास नव्हता यामुळे त्या नैसर्गिक प्रकाराला विशेष महत्व द्यावे असे त्या काळातल्या कोणालाही वाटले नसेल. सतराव्या शतकातले काही शास्त्रज्ञ कुतूहलापोटी या विषयावर संशोधन करायला लागले. ओटो व्हॉन गेरिक या शास्त्रज्ञाने सन १६७२ मध्ये गंधकाच्या एका मोठ्या गोलकाला घासून त्यातून कृत्रिम वीज निर्माण केली आणि तिच्यामुळे होणारे आकर्षण (Attraction) आणि प्रतिकर्षण (Repulsion) प्रयोगामधून दाखवून दिले. त्यानंतर धन आणि ऋण प्रभार यांच्यामध्ये ठिणगी पडते आणि त्यातून विद्युत् विमोच (Electric Discharge) होतो हे शास्त्रज्ञांना समजले. अठराव्या शतकातल्या बेंजामिन फ्रँकलिन याने १७५०च्या सुमाराला कांच आणि शिशाच्या चपट्या पट्ट्या वापरून विजेचा प्रभार (Charge /चार्ज) साठवून ठेवण्याचे एक संधारित्र (Capacitor कपॅसिटर) तयार केले. तसेच आकाशात चमकणारी वीज आणि स्थिर विद्युत या दोघी एकच असतात असे प्रयोगाने सिद्ध करून दाखवले.  सन १७६७ पर्यंत या विषयावर इतके संशोधन झाले होते की जोसेफ प्रीस्टली याने ते गोळा करून विजेचा एक सविस्तर इतिहास ग्रंथ लिहिला होता. प्रीस्टलीनेच हा प्रभार वाहून नेणारे वाहक (Conductor) आणि वाहून न नेणारे दुर्वाहक (bad conductor) यांचे शोध लावले. अशा प्रकारे वीज या विषयावरील संशोधनात खूप हळूहळू प्रगति होत होती, पण विजेचा प्रवाह तयार करणारे साधन मात्र अजून निघाले नव्हते.

अलेसँडर व्होल्टा या इटालियन शास्त्रज्ञाने १७७५ मध्ये विद्युत प्रभार निर्माण करण्यासाठी इलेक्ट्रोफोरस नावाचे उपकरण बनवले. यामुळे विजेवर अधिक संशोधन करायला मदत झाली. त्याने विजेच्या प्रभाराला साठवून ठेवणारा गुणधर्म विद्युत धारिता (Electric Capacitance) या विषयावर संशोधन करून संधारिकांवरील विजेचा दाब त्यातील पदार्थाच्या विद्युत धारितेच्या सम प्रमाणात असतो हे दाखवून दिले. या नियमाला व्होल्टाचा नियम असेच नाव आहे. व्होल्टाचा समकालीन शास्त्रज्ञ गॅल्व्हानी हा मृत बेडकांवर संशोधन करत होता. प्रयोग करतांना त्याला एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली. त्याने एका बेडकाला तांब्याच्या तारेने बांधून ठेवले होते आणि त्याच्या पायाला लोखंडाचे अवजार लागताच तो पाय एकदम शॉक लागल्यासारखा आखडला. यावरून प्राण्यांच्या शरीरात वीज निर्माण होते असा निष्कर्ष गॅल्व्हानीने काढला आणि त्याला अॅनिमल इलेक्ट्रिसिटी असे नाव ठेवले. या संशोधनामधून प्राण्यांच्या शरीरांच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळाली.

पण व्होल्टाने यावर वेगळा विचार केला. त्याने तांबे, लोखंड, शिसे, जस्त आदि निरनिराळ्या धातूंची अवजारे वापरून बेडकावर प्रयोग केल्यावर त्याला वेगवेगळी निरीक्षणे मिळाली. त्यामुळे या बाबतीत फक्त प्राण्याच्या शरीराचा गुणधर्म नसून धातूंचासुद्धा सहभाग आहे असे त्याने ओळखले. त्याने त्यानंतर निरनिराळ्या धातूंचे तुकडे वेगवेगळ्या रसायनांमध्ये बुडवून प्रयोग केले आणि बेडकाशिवायही वीज निर्माण करून दाखवली. प्रत्येक धातूचे एक विद्युत विभव (Electric Potential) असते हे त्याने पाहिले आणि या विभवाप्रमाणे धातूंची विद्युतरासायनिक मालिका (Electrochemical Series) तयार केली. त्यासंबंधीच्या नियमालाही व्होल्टाचेच नाव आहे. (Volta's Law of the electrochemical series) दोन भिन्न धातूंचे इलेक्ट्रोड रसायनामध्ये बुडवून ठेवले तर त्याच्यामध्ये एक विद्युतगामक बल (Electromotive Force) तयार होते हे दाखवून ते विद्युत विभवामधील फरकाच्या समप्रमाणात असते असा नियम सांगितला. जगातल्या सर्व विजेच्या बॅटऱ्या या तत्वावर काम करतात.

व्होल्टाने कृत्रिमरीत्या विजेचा प्रभार निर्माण करणारे असे व्होल्टाइक पाइल हे साधन तयार केले. त्यात जस्त आणि तांब्याच्या चपट्या चिपा आणि रसायनांत भिजवलेले पुठ्याचे तुकडे आलटून पालटून एकावर एक ठेऊन त्यांचे अनेक थर केले आहेत. यातल्या प्रत्येक थरांमध्ये थोडा थोडा प्रभार तयार होऊन साठत जातो. व्होल्टाने अशा प्रकारे प्रथमच रासायनिक पद्धतीने वीज तयार करून दाखवली हे या प्रगतीमधले एक मोठे पाऊल होते. अशा प्रकारे साठवलेला विजेचा प्रभार तारेमधून वाहून नेला तर लगेच नवा प्रभार तयार होतो. यामुळे सलगपणे काही वेळ वाहणारा विजेचा प्रवाह तयार करणे प्रथमच शक्य झाले. तोपर्यंत स्थायिक विजेमधून फक्त एक ठिणगी पाडणेच शक्य झाले होते, व्होल्टाने पहिल्यांदाच विजेला प्रवाही करून दाखवले.

याशिवाय व्होल्टाने वायूंच्या रसायनशास्त्रावर संशोधन करून मीथेन या वायूचा शोध लावला. मीथेन हा वायू निसर्गातसुद्धा तयार होत असतो. व्होल्टाने त्याला बंद पात्रामध्ये साठवून आणि त्यात विजेची ठिणगी टाकून त्याला पेटवून दाखवले. त्याने विजेवर केलेल्या  अत्यंत मौलिक संशोधनाचा मान ठेऊन विद्युत विभव (Electric Potential) आणि विद्युतगामक बल (Electromotive Force) यांच्या एककाला व्होल्ट असे नाव दिले आहे. विजेचा दाब व्होल्टेजमध्येच व्यक्त केला जातो आणि त्याचा उल्लेख प्रत्येक उपकरणाच्या बाबतीत होत असल्यामुळे व्होल्टेज हा शब्द आपल्या चांगल्या परिचयाचा आहे.


Sunday, April 14, 2019

माझी घरातली वेधशाळा

आमच्या लहानपणी आम्ही नेहमी गच्चीवर झोपत होतो. त्या ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी सगळीकडे मिट्ट काळोख असल्यामुळे आकाशातल्या असंख्य चांदण्या चमचमतांना दिसत. माझ्या वडिलांना खगोलशास्त्राची चांगली माहिती होती. ते आम्हाला राशी, नक्षत्रे आणि त्यांच्या गर्दीमधून संचार करणारे ग्रह यांची मजेदार माहिती सांगत. सप्तर्षींच्या सहाय्याने ध्रुव तारा कसा शोधायचा ते मी शिकलो. मृग आणि हस्त नक्षत्र, वृश्चिक रास यांना ओळखणे त्यांच्या विशिष्ट आकारांच्या रचनांमुळे तसे सोपे होते. सूर्याचे भ्रमण कोणत्या राशीत चालले आहे यावरून सूर्यास्त किंवा सूर्योदयाला कोणती रास पूर्व किंवा पश्चिम क्षितिजावर असते हे ठाऊक असायचे आणि त्यावरून अंदाजाने आकाशातल्या इतर राशी समजायला लागल्या होत्या. ग्रहांच्या गति समजल्यानंतर त्यांना शोधणेही सोपे झाले होते. पंचांगामधल्या कुंडलीत मांडलेले ग्रह आकाशात शोधायचा मला नादच लागला होता.

शालेय जीवन संपवून मुंबईपुण्याला आल्यावर तिथल्या झगमगाटात माझ्या आकाशातले ग्रहतारेच हरवून गेले. तिथल्या इमारतींच्या गर्दीतून आभाळाचा एकादाच तुकडा कधी मुद्दाम पाहिला तर दिसायचा. त्यात लुकलुकणारी एकादी चांदणी दिसलीच तरी तिची ओळख पटणे अशक्य होते. पण आता पन्नास वर्षांनंतर मला पुन्हा एकदा आकाशाकडे पहायची संधी मिळाली किंवा बुद्धी झाली. इथेही जमीनीवरील दिव्यांच्या आकाशातले झगमगाटामुळे फारसे काही दिसू शकत नाहीच, पण जेवढे दिसते त्याचाच अर्थ लावायचा प्रयत्न मी आता सुरू केला आहे. 

आमच्या सव्वीसाव्या मजल्यावरच्या घराच्या बाह्य भिंती पूर्वपश्चिम रेषेमध्ये आहेत. माझ्या खोलीच्या खिडकीमधून समोर पाहिल्यास दक्षिण दिशा दिसते, तसेच जवळजवळ १५० अंश इतके दूरवर पसरलेले वर्तुळाकार क्षितिजही दिसते. बाल्कनीत जाऊन थोडे जास्त आकाश पहाता येते. मी या घरी रहायला आलो तेंव्हा पावसाळा सुरू होता. त्यामुळे बहुतेक दिवस आभाळ ढगाळ असायचे. एकाद्या दिवशी जास्त घनदाट ढगांची गर्दी झाली तर सूर्यसुद्धा झाकून जायचा, पण तुकळक ढग असले तरी तारे दिसणे कठीणच होते. पावसाळा संपत आल्यावर सप्टेंबरच्या अखेरीला मला एकदा अचानकच सकाळच्या सूर्योदयाचे स्पष्ट दर्शन घडले. आधी पूर्वेच्या बाजूला आलेला लालिमा, तिथून आकाशभर पडलेले लाल, पिवळ्या, केशरी रंगांचे झोत आणि त्यातून हळून लालचुटुक सूर्यबिंबाचे प्रगट होणे वगैरे सगळे मी बाल्कनीत बसून आ वासून पाहिले. तो सूर्योदय नेमका किती वाजता झाला ती वेळ आणि क्षितिजावरच्या कोणत्या बिंदूपाशी झाला ते स्थान मी नोंदवून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी ठरवून पहाटे लवकर उठून त्याची वाट पहात बसलो. हळूहळू मला त्याची सवय होऊन गेली.

ओळीने काही दिवस रोज सूर्योदय पहात असतांना माझ्या लक्षात आले की क्षितिजाखालून सूर्य वर येतांना कसा दिसतो याबद्दलच्या मुळात वेगळ्याच कल्पना आपल्या मनात असतात. तो डोंगराच्या बेचक्यामधून डोकावून पहातांना आधी त्याचा एक लहानसा तुकडा दिसेल आणि तो हळूहळू मोठा मोठा होत जातांना दिसत असेल अशी माझी कल्पना होती. पण तसे काही होतच नव्हते. म्हणून मी दि. १९ नोव्हेंबरला लिहिले, "खाली दिलेले पहिले चित्र सर्वांच्या चांगल्या माहितीतले असेल. बहुतेकांनी सूर्योदयाची अशीच अनेक चित्रे लहानपणी स्वतः काढली असतील आणि पुढे आपली लहान भावंडे, मुले, भाचे, पुतणे, नातवंडे वगैरेंनाही शिकवली असतील. मी प्रत्यक्षात असंख्य ठिकाणचे सूर्योदय पाहिले आहेत, पण या चित्रात दाखवल्यासारखा सूर्योदय मात्र कधीही कुठेच दिसला नाही. आजकाल रोजच सकाळी माझ्या घराच्या बाल्कनीमधून मला सूर्योदयाचे दर्शन घडते. क्षितिजाला लागून एक धूर, धूळ, धुके आणि ढग यांनी भरलेला दाट असा हवेचा पट्टा असतो. सूर्याची किरणे त्याच्या मागून निरनिराळ्या रंगांची उधळण आकाशात करत असतात, स्वतः सूर्यनारायण मात्र त्या पट्ट्यामधून थोडा वर आल्यानंतर फिक्कट असा दिसायला लागतो आणि पाहता पाहता तो प्रखर होत वर वर चढतो. हे दुसऱ्या आणि तिसऱ्या छायाचित्रात दिसेल."

सूर्याच्या उगवण्याची जागासुद्धा हळूहळू किंचित बदललेली दिसत होतीच. माझ्याकडे कुठलेही मोजमोप घेण्याचे यंत्र नसल्यामुळे मी त्याची अंशांमध्ये नोंद ठेवत नसलो तरी क्षितिजावरील इमारतींच्या संदर्भाने सूर्यबिंबाचा वेध घेतच होतो. ते रोज किंचित उजवीकडे म्हणजेच आग्नेयेच्या दिशेने सरकत होते. यालाच दक्षिणायन असे म्हणतात.  २१ डिसेंबरला तो उगवण्याची जागा पूर्वेपासून सुमारे २२-२३ अंशाने किंवा काटकोनाच्या पाव हिश्याने सरकलेली होती. ती मी फोटोत बंद करून ठेवली.  त्या दिवशी सूर्योदय जवळजवळ सव्वासात वाजता झाला होता याचीही नोंद घेतली.

त्यानंतर उत्तरायण सुरू झाले. रोजचा सूर्योदय एकादे मिनिट उशीराने व्हायला लागला, तसेच त्याच्या उगवण्याची जागा रोज किंचित डाव्या बाजूला सरकायला लागली. हा फरक अगदी सूक्ष्म असला तरी तीन चार दिवसात तो एक इमारतीच्या ऐवजी दुसऱ्या इमारतीच्या मागून वर आलेला जाणवत असे. २१ मार्चला वसंतसंपाताच्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता तो बरोबर पूर्व दिशेला आमच्या घराच्या भिंतीला लागूनच उगवला. त्यानंतर मला घरबसल्या सूर्योदय दिसणे बंद झाले. आता मला पहाटे उठून खाली उतरून गेल्याशिवाय सूर्योदय पाहता येत नाही.

सूर्याच्या उदयापासून त्याच्या अस्तापर्यंत तो आकाशात कोणत्या मार्गाने जातो याचा अभ्यास करून "सूर्याचा आकाशातला प्रवास" या नावाची पोस्ट मी माझ्या या अनुदिनीवर मागच्या महिन्यातच लिहिली आहे. http://anandghan.blogspot.com/2019/03/blog-post_25.html  याचा सारांश असा आहे की आपला सूर्य आपला आकाशातला मार्ग सुद्धा रोजच किंचित बदलत असतो. उत्तर गोलार्धामधील युरोप अमेरिकेत जिथे तो कधीच डोक्यावर येत नाही तिथेसुद्धा या चित्रात दाखवल्याप्रमाणे आपला मार्ग वर्षभर बदलत असतो. थंडीच्या दिवसात तो खालच्या खालीच पाचसहा तास फिरून मावळतीला जातो तर उन्हाळ्याच्या दिवसात सावकाशपणे सतरा अठरा तास थोड्या लांबच्या रस्त्यावरून आकाशात फिरत राहतो.

एकदा मी पहाटे उठून खिडकीबाहेर पाहिले तर अजून सूर्योदयाला उशीर असल्यामुळे बाहेर काळोखाचे साम्राज्य होते आणि कविवर्य भा रा तांबे यांच्या शब्दात सांगायचे झाले तर "घनतमी शुक्र बघ राज्य करी"त होता. पुण्याच्या वातावरणात इतर फारशा चांदण्या स्पष्ट दिसत नसल्या तरी त्या होत्याच. मी बाल्कनीत येऊन पाहिले तर थोड्या उंचावर तेजस्वी गुरुमहाराजही विराजमान होते. मी या दोघांना पटकन ओळखले आणि इंटरनेटवर थोडा शोध घेतल्यावर त्या दोघांच्यामध्ये शनिमहाराज असल्याचे समजले. मग थोडे निरखून पाहिल्यावर किंचित निळसर छटा असलेला हा मंद ग्रहसुद्धा सापडला. तोपर्यंत पहाट व्हायला आल्यामुळे सगळ्याच तारका मंद मंद होत अदृष्य झाल्या. त्या दिवसानंतर मला काही कारणाने कधीही लवकर जाग आली की मी लगेच खिडकीत जाऊन त्यांचे दर्शन घेतो. त्यांच्या मंद गति मला माहीत असल्यामुळे त्यांच्या आकाशातल्या स्थानामध्ये रोजच्या रोज फारसा फरक पडत नाही हे मला लहानपणापासून ठाऊक होते. त्यामुळे ते आधी ज्या ठिकाणी दिसले होते त्याच्या जवळपास दिसायचेच.


शनि हा ग्रह फारच मंद आहे, तो एकेका राशीत तब्बल अडीच वर्षे मुक्का ठोकून बसतो. गुरु त्या मानाने थोडा चपल आहे, दर वर्षी एका राशीने पुढे जातो. त्यामुळे महिनाभरात बोटभर सरकला आहे. शुक्र मात्र सूर्याच्याच वेगाने दर महिन्याला रास बदलतोच, शिवाय त्याच्याही कधी मागे तर कधी पुढे होतांना दिसतो. त्यामुळे महिनाभरात तो गुरु आणि शनि यांच्यापासून चांगला १५-२० अंशांनी दूर गेला आहे. माझ्याकडे चांगला कॅमेरा नसल्यामुळे मी इंटरनेटवरून आणि मित्रांकडून मिळालेल्या त्यांच्या आकृति खाली दिल्या आहेत. या आकृति दोन निरनिराळ्या खंडामधील असल्यामुळे आणि निरनिराळ्या अँगलमधून काढलेल्या असल्यामुळे त्या ग्रहांना जोडणारी रेषा वेगवेगळ्या बाजूने आणि कोनाने तिरक्या दिसतात, पण त्यांच्यामधील अंतरे मात्र प्रमाणातच आहेत.

चंद्र हा आपल्या पृथ्वीभोवतीच महिनाभरात प्रदक्षिणा घालतांना तेरा राशींमधून पुढे सरकतो. तो रोजच आदल्या दिवशीपेक्षा बारा अंशांनी पुढे जातो आणि महिनाभरात आकाशातल्या सर्व ग्रहांबरोबर एक एकदा तरी युति करतोच. मार्चच्या अखेरीस तो गुरु आणि शनि यांच्या जवळ येऊन गेला. तो शनिच्या तर इतक्या जवळ आलेला दिसला की आणखी काही काळात तो शनिला झाकून किंवा गिळून टाकेल की काय असे वाटले होते, पण तेवढ्यात सकाळ होऊन आकाशात उजेड झाला. कदाचित युरोपमधून ते दृष्य दिसलेही असेल.


दोन एप्रिलच्या पहाटे एक अद्भुत योग जुळून आला होता. तेरा वर्षांपूर्वी मी जेंव्हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली तेंव्हा त्या पानावर काय लिहावे असा प्रश्न मला पडला होता. त्या काळात अचानक मला त्रयोदशीच्या पहाटेच्या लोभसवाण्या चंद्रकोरीचे दर्शन घडले आणि एक विषय मिळाला. त्यातूनच पुढे 'तोच चंद्रमा नभात' ही मालिका सुरू करून मी तिचे बत्तीस भाग लिहिले आणि माझ्या या छंदाला आकार आला. दोन एप्रिलच्या पहाटे चंद्रमा आणि शुक्र यांची युति होणार आहे हे मला आधीच समजले होते म्हणून मी मुद्दाम पहाटे लवकर उठून या नाजुक चंद्रकोरीचे आणि तिच्या शेजारीच तळपणाऱ्या तेजस्वी शुक्राचे दर्शन घेतले. दोघेही जवळजवळ तितक्याच तेजाने चमकत होते, डोक्यावर गुरु होताच आणि या दोघांच्या मधल्या जागेत शनि होता. शिवाय या वेळी बुध हा ग्रहसुद्धा चंद्राच्या जवळ येणार होता त्यामुळे त्याचा शोध घेणे सोपे झाले आणि बोनस म्हणून बुध या ग्रहाचे दुर्मिळ असे दर्शनही झाले. थोड्या वेळाने रविचा उदय होणारच होता. अशा प्रकारे सात वारांना ज्यांची नावे आहेत त्या सातापैकी सहा पहायला मिळााले. माझी खिडकीतली वेधशाळा अशी चांगली चालली आहे.


मंगळ हा ग्रह मात्र संध्याकाळच्या पश्चिमेच्या आकाशात असतो पण तो भाग माझ्या खिडकीमधून दिसत नाही. नऊ एप्रिलला त्याची चंद्राबरोबर अॅपॉइंटमेंट असल्याचे समजले तेंव्हा मी संध्याकाळच्या फिरण्यानंतर बाहेरच थोडा जास्त वेळ रेंगाळत राहिलो आणि चंद्राच्या आधाराने लालसर मंगळाला शोधून काढले. या वेळेलाही बोनस म्हणून जवळच असलेले मृग नक्षत्र आणि व्याधाचा तारा पहायला मिळाला. आणखी काही महिन्यांनी हे सर्वही पहाटेच्या आकाशात दिसायला लागतील आणि एकाद्या दिवशीचे आकाश निरभ्र असले तर दिसतीलही. 

Saturday, March 30, 2019

फ्रेंच शास्त्रज्ञ जोसेफ लुई गे ल्युसॅक



युरोपातल्या मध्ययुगापर्यंतच्या काळात फक्त तत्वज्ञान (Philosophy) म्हणजे ज्ञान असे समजले जात होते आणि पुरातन काळातल्या विद्वानांनी जेवढे काही लिहून ठेवले होते त्याचाच अभ्यास पिढ्यान् पिढ्या होत होता. कुणालाही सहज न पटणारा असा क्रांतीकारक नवा विचार मांडायला तिकडेसुद्धा  समाजाचीच परवानगी नव्हती. ज्ञानाचा संबंध धर्माशी जोडून काहीही वेगळे मत मांडणे हे धर्माला आव्हान दिल्यासारखे समजले जाई आणि त्या माणसाला वाळीत टाकले जाई. भारतातसुद्धा 'बाबावाक्यम् प्रमाणम्' असेच शतकानुशतके समजले जात असे, किंबहुना अजूनही तसे समजले जाते. पण कोपरनिकस, गॅलीलिओ, न्यूटन वगैरें शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून त्यांना अनेक नव्या गोष्टी समजल्या किंवा अधिकाधिक नवी माहिती उजेडात येत गेली आणि त्यांनी ती धीटपणे प्रसिद्ध केली. यामधून तयार झालेले नवे ज्ञानसुद्धा निसर्गाचे तत्वज्ञान (Natural Philosophy) या नावाने ओळखले जायला लागले. त्याला विज्ञान (Science) हे नाव मिळाले नव्हते आणि त्याच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र वगैरे शाखा तर नव्हत्याच. त्या काळातले संशोधक अनेक प्रकारचे विविध प्रयोग करून नवी शास्त्रीय माहिती मिळवण्याचा आणि तिला सिद्धांतांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करत असत. त्या संशोधकांच्या विषयांमध्ये सजीव प्राणी तसेच निर्जीव पदार्थ अशा सगळ्यांचा समावेश होत असे.

जमीन, पाणी, हवा या महाभूतांपैकी जमीन किंवा घनरूप पदार्थ आणि पाणी किंवा द्रवरूप पदार्थ आपल्याला हाताळता येत असल्यामुळे त्यांच्यावर प्रयोग करून त्या पदार्थांचा अभ्यास करणे तुलनेने सोपे असते. ते काम प्राचीन काळापासून चालत आले होते. अशा प्रयोगांमधूनच अनेक प्रकारचे धातू आणि औषधे, रसायने वगैरे वस्तू तयार केल्या जात होत्या. पण अदृष्य आणि विरळ अशा हवेवर काम करणे त्या मानाने खूप कठीण होते. हवेला बंद झाकणाच्या बरणीमध्ये किंवा फुग्यांमध्ये कोंडून ठेऊनच तिच्यावर संशोधन करणे भाग होते. या सगळ्या अडचणींना सामोरे जाऊन सतराव्या शतकातल्या अनेक शास्त्रज्ञांनी हवा आणि इतर वायूंवर संशोधन करायला सुरुवात केली. त्यांच्या अस्तित्वापासून ते विशिष्ट गुणधर्मांपर्यंत शास्त्रीय माहिती जमा होत गेली. टॉरिसेली, पास्कल, बॉइल, चार्ल्स आदि शास्त्रज्ञांनी महत्वाचे शोध लावून या संशोधनामध्ये मौलिक कामगिरी केली. जोसेफ लुई गे ल्युसॅक या फ्रेंच शास्त्रज्ञाने यात महत्वाची भर घातली.

जोसेफ लुई गे ल्युसॅक याचा जन्म एका सधन फ्रेंच परिवारात इसवी सन १७७८ मध्ये झाला. पण तो लहान असतांनाच झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीनंतर काही काळ त्याच्या पित्याला तुरुंगात टाकले गेले होते. चर्चमधल्या धर्मगुरूंनी त्याला शिक्षण दिले. त्याने भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचा अभ्यास करून त्या विषयांचे अध्यापन केले तसेच संशोधनाला वाहून घेतले.

गे ल्युसॅक याने हवेवर प्रयोग करतांना पाहिले की हवेला बंद पात्रामध्ये तापवत असतांना तापमानासोबतच हवेचा दाबही सारखा वाढत जातो. तापमान जितके वाढेल त्या प्रमाणात तिचा दाब वाढतो तसेच हवा थंड होतांना तिचे तापमान जितके कमी होईल त्या प्रमाणात तो दाब कमी होतो. त्याने यावर विचार केला. जॅक चार्ल्सने लावलेल्या शोधाला तोपर्यंत प्रसिद्धी मिळालेली नसली तरी गे ल्युसॅकला त्याची माहिती समजली होती. त्या नियमानुसार "वायूचे घनफळ (व्हॉल्यूम) त्याच्या तापमानाच्या सम प्रमाणात असते." म्हणजेच बंद पात्रामध्ये असलेल्या हवेला तापवले तर त्याचे घनफळ वाढायला पाहिजे, पण त्यासाठी पात्रामध्ये जास्तीची जागा नसल्यामुळे त्या हवेला पात्रात उपलब्ध असलेल्या जागेतच कोंडले जाते. समजा पात्रातल्या हवेचे घनफळ तापवल्यामुळे वाढून दुप्पट झाले तरीही त्या वाढलेल्या घनफळाला निम्मे होऊन त्या पात्रातच मावावे लागते. बॉइलच्या नियमानुसार घनफळ आणि दाब व्यस्त प्रमाणात असतात. त्यामुळे घनफळ अर्धे झाले तर त्याचा दाब दुप्पट होतो. यावरून गे ल्युसॅकच्या निरीक्षणाला समाधानकारक शास्त्रीय स्पष्टीकरणही मिळाले. त्याने ही सगळी माहिती प्रसिद्ध करून स्वतःबरोबरच चार्ल्सच्या संशोधनालाही प्रसिद्धी दिली आणि आपल्या स्वतःच्या शोधाला चार्ल्सच्या नियमाचा आधार असल्याचे दाखवून दिले. "घनफळ स्थिर असेल तर वायूचा दाब त्याच्या तापमानाच्या सम प्रमाणात असतो" हा गे ल्यूसॅकचा नियम 'दाबाचा नियम' ('Pressure Law') या नावानेही ओळखला जातो. बॉइल आणि चार्ल्स यांनी केलेल्या प्रयोगांमधून त्यांना जी माहिती समजली त्यांच्या आधारावर त्यांनी निसर्गाचे दोन प्रयोगसिद्ध नियम सांगितले होते. पण त्या नियमांनुसार दाब आणि घनफळात बदल का होतात याची शास्त्रीय कारणे तेंव्हा कुणालाच माहीत नव्हती. गे ल्यूसॅकचा नियम मात्र या दोन नियमांच्या आधाराने सैद्धांतिकदृष्ट्या (theoretically) आणि शिवाय प्रयोगानेही (experimentally) सिद्ध होत होता.
वर दिलेल्या संशोधनांवरून वायूंचे तीन मुख्य नियम समजले. या तीन्ही नियमांना मिळून वायूंचे नियम (Gas Laws) असे म्हणतात.
१. बॉइलचा नियम ...... P X V = k ... दाब  X घनफळ = स्थिरांक .... जेंव्हा तापमान स्थिर असते.
२. चार्ल्सचा नियम ...... V = k X T ... घनफळ = स्थिरांक X तापमान .... जेंव्हा दाब स्थिर असतो.
३. गे ल्यूसॅकचा नियम .. P = k X T ... दाब = स्थिरांक X तापमान .... जेंव्हा घनफळ स्थिर असते.
घनरूप पदार्थांची लांबी, रुंदी, जाडी, व्यास, परीघ वगैरे मोजून गणिताने त्यांचे घनफळ काढता येते, द्रवरूप पदार्थांचे घनफळ मापाने मोजता येते, पण वायुरूप पदार्थांचे घनफळ स्थिर नसते. ते त्यांचा दाब आणि तापमान यांच्यावर अवलंबून असते. त्यामुळे ते केंव्हाही अमूक इतक्या तापमानाला आणि इतक्या दाबावर इतके लिटर किंवा घनफूट असेच सांगावे लागते. सिलिंडरमध्ये भरलेल्या वायूंच्या घनफळांची मोजणी, हिशोब वगैरे करण्यासाठी प्रमाणभूत तापमान आणि दाब (standard temperature and pressure) किंवा (STP) ठरवतात आणि Liters / Cubic feet at STP असे सांगतात. 
जोसेफ लुई गे ल्युसॅकने दुसरा एक अत्यंत महत्वाचा शोध लावला. त्याने असे दाखवून दिले की हैड्रोजन आणि ऑक्सीजन या दोन वायूंचा २ : १ या ठराविक प्रमाणातच संयोग होऊन त्यामधून पाण्याची वाफ तयार होते. नायट्रोजन आणि हैड्रोजन यांचा १:३ या प्रमाणातच संयोग होऊन अमोनिया हा वायू तयार होतो. अशा प्रकारे दोन वायूंचा संयोग होतांना त्यांच्या आकारमानांचे प्रमाण नेहमीच १,२,३ अशा पूर्ण अंकांमध्ये सोपे प्रमाण असते. सगळेच वायू कितीही प्रमाणात एकमेकांमध्ये मिसळतात पण त्यांच्यामधील रासायनिक क्रियांमुळे होणारे संयोग फक्त ठराविक प्रमाणातच होतात. समजा हवेने भरलेल्या एकाद्या पात्रात थोडासा हैड्रोजन वायू सोडला तर तो लगेच हवेत सगळीकडे पसरेल आणि त्यात ठिणगी टाकली तर त्या पात्रात जितका हैड्रोजन वायू असेल तो सगळा जळून जाईल पण त्याच्या निम्मा इतकाच ऑक्सीजन खर्च होईल आणि उरलेला ऑक्सीजन वायू हवेत तसाच शिल्लक राहील. गे ल्यूसॅकच्या या नियमामुळे रासायनिक क्रियांची समीकरणे मांडण्याला मदत झाली.

त्याशिवाय गे ल्युसॅकने इतर अनेक प्रकारचे संशोधन केले. त्याने वातावरणाच्या अभ्यासासाठी ऊष्ण हवेचे बलून तयार करून ते सात हजार मीटर इतक्या उंचीपर्यंत आकाशात उडवले आणि त्याला जोडलेल्या पाळण्यात बसून तो स्वतः हवेत उडून आला. आपल्या या उड्डाणात त्याने निरनिराळ्या उंचीवरील वातावरणामधल्या हवेचे नमूने बाटल्यांमध्ये गोळा केले आणि ते प्रयोगशाळेत तपासून पाहिले. पर्वतशिखरांवर किंवा हवेत उंच उडल्यावर हवेचा दाब कमी होत असतो, तरीही हवेमधील नायट्रोजन, ऑक्सीजन आदि घटकांचे प्रमाण मात्र सगळीकडे सारखेच असते हे त्याने या प्रयोगांमधून दाखवून दिले. त्याने बोरॉन आणि आयोडिन या मूलद्रव्यांचा शोधही लावला, प्रयोगशाळांमधल्या उपकरणांमध्ये काही महत्वाच्या सुधारणा केल्या. अशा प्रकारे जोसेफ लुई गे ल्युसॅकने विज्ञानाच्या, विशषतः रसायनशास्त्राच्या प्रगतीला मोठा हातभार लावला.
---------------------------
फ्रेंच शास्त्रज्ञ जोसेफ लुई गे ल्युसॅक (Shikshan Vivek) http://shikshanvivek.com//Encyc/2019/3/23/French-Scientist-Joseph-Louis-Gay-Lussac.aspx


Monday, March 25, 2019

सूर्याचा आकाशातला प्रवास



आपल्या प्राचीन समजुतींप्रमाणे सूर्यनारायण रोज सात घोड्यांच्या रथात बसून क्षितिजावर प्रगट होतो आणि दिवसभर आकाशाचा फेरफटका मारून पुन्हा क्षितिजापलीकडे जाऊन अदृष्य होतो, पण तो आपला रथ कोणत्या राजमार्गावरून नेत असेल? सोप्या शब्दात सांगायचे झाले तर दररोज सकाळी पूर्व दिशेला सूर्य उगवतो, तो आकाशात सरळ वर वर चढत दुपारी डोक्यावर येतो आणि त्यानंतर पलीकडच्या दिशेने खाली उतरत जातो आणि संध्याकाळी पश्चिमेला मावळतो असे साधारणपणे समजले जाते, आपण लहानपणापासून तसेच शिकत आलो आहोत आणि दक्षिण भारतात किंवा महाराष्ट्रात ते ढोबळ मानाने बरोबर वाटते. दिवसाच्या उन्हात आपण प्रकाशमान तळपत्या सूर्याकडे पाहू शकत नाही, शिवाय कुठल्या वेळी या अथांग आकाशातल्या नेमक्या कोणत्या जागी तो आहे हे समजायला तिथे कसल्याच खुणा नसतात. मग तो रोज आकाशामधून नेमका कोणत्या वाटेवरून प्रवास करतो हे आपल्याला कसे समजणार ? सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी ज्या ठिकाणी सूर्याचे बिंब दिसते त्या ठिकाणी क्षितिजावर असलेल्या इमारती, झाडे, डोंगरमाथा अशा खुणांवरून ती विवक्षित जागा आपल्याला ओळखता येते आणि लक्षात ठेवता येते. आपल्या माथ्यावर असलेला आकाशातला कळसाचा बिंदू म्हणजे झेनिथ आपल्याला अंदाजाने समजतो. त्या ठिकाणी सूर्य आला तर जमीनीवरील वस्तूची सावली जमीनीवर पडत नाही. खगोलशास्त्राचा अभ्यास करणारे लोक भूमितीच्या सहाय्याने संपूर्ण आकाशाची अक्षांश आणि रेखांशात विभागणी करतात आणि त्यांच्या आधाराने सूर्य, चंद्र, ग्रह, तारे वगैरे गोल नेमक्या कोणत्या मार्गाने भ्रमण करत असतात याच्या तपशीलवार नोंदी ठेवतात. भारतामधून पाहतांना ढोबळमानाने पाहता हे सगळे ग्रह आणि तारे आपल्याला डोक्यावरून जातांना दिसतात तसे युरोपअमेरिकेच्या उत्तर भागात दिसत नाहीत. एकदा मी इंग्लंडमध्ये डिसेंबरमध्ये गेलेलो असतांना तिथे पाहिले की सूर्य खूप उशीराने जवळजवळ आग्नेयेला उगवत होता आणि जेमतेम पाचसहा तासाचा दिवस संपताच खूप लवकर ईशान्येकडे मावळून जात होता. तेवढ्या वेळात म्हणजे दिवसभरात तो केंव्हाच आकाशात फारसा उंचावर चढतच नव्हता. तो दिवसभर आकाशाच्या दक्षिणेकडील भागात खालच्या खालीच वक्राकार मार्गाने तिरकस सरकत होता. 


लक्ष देऊन पाहिल्यास असे दिसते की सूर्याचे बरोबर पूर्वेला उगवणे, माध्यान्हीला झेनिथला डोक्यावर येणे आणि पश्चिमेला मावळणे अशी गोष्ट फक्त विषुववृत्तावरील ठिकाणीच आणि तीही वर्षामधून फक्त दोनदाच घडते. इतर ठिकाणी कोणत्याही दिवशी अगदी तसेच कधीच घडत नसते. मार्च आणि सप्टेंबर महिन्यांच्या २१ तारखेला जगातल्या सर्वच ठिकाणी पूर्वेला सूर्य उगवतो, पण माध्यान्हीला म्हणजे स्थानिक वेळेप्रमाणे दुपारी १२ वाजता तो माथ्यावर मात्र फक्त विषुववृत्तावरच येतो, इतर जागी येत नाही. इतर जागी माध्यान्ह होते तेंव्हा तो  झेनिथच्या जवळपास येतो, पण जरासा उत्तरेला किंवा दक्षिणेला दिसतो आणि त्यानुसार दक्षिण किंवा उत्तरेला सावली पडते. दक्षिण गोलार्धात तो उत्तरेला दिसतो तर दक्षिण गोलार्धात तो उत्तरेकडे दिसतो.  २१ मार्चनंतर तो रोज थोडा थोडा उत्तरेकडे सरकत जातो आणि विषुववृत्तापासून उत्तरेकडे असलेल्या ठिकाणी दुपारी १२ वाजता माथ्यावर येऊ लागतो. आपण जसजसे विषुववृत्तासून उत्तरेकडे जाऊ तसतसे सूर्याच्या माथ्यावर येण्याची तारीख पुढे पुढे जाते. पुण्यासारख्या ठिकाणी २१मार्चला माध्यान्हीला तो दक्षिणेकडे कललेला दिसतो, पण त्यानंतर रोज उत्तरेकडे सरकत १३ मेच्या सुमाराला दुपारी तो बरोबर माथ्यावर येतो. त्या दिवशी दुपारी माध्यान्हीला आपली सावली कुठेच दिसत नाही. ती आपल्या पायावरच पडते. पण त्या दिवशीचा सूर्योदय मात्र ईशान्येच्या दिशेने कललेल्या वेगळ्याच जागी झालेला असतो. कर्कवृत्तावर म्हणजे सांचीच्या जवळपास २१ जूनला सूर्य बरोबर माथ्यावर येतो. कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या पलीकडील प्रदेशात तर सूर्य कधीही माथ्यावर येतच नाही. २१ जूननंतर दक्षिणायन सुरू होते. त्यानंतर सूर्याच्या उगवण्या, मावळण्या आणि दुपारी माथ्यावर येण्याच्या जागा दररोज दक्षिणेकडे सरकत जातात. ३१ जुलैच्या सुमाराला दुपारी तो पुन्हा पुण्याला बरोबर माथ्यावर येतो, पण तेंव्हा पावसाळी ढगाळ वातावरणामुळे कदाचित तो दिसणार नाही. पुढे २१ सप्टेंबरला तो पुन्हा विषुववृत्तावर माथ्यावर येतो.

फक्त मार्च आणि सप्टेंबर महिन्यांच्या २१ तारखेलाच सूर्य क्षितिजावर जिथून उगवतो ती जागा जगातल्या सर्वच ठिकाणी क्षितिजावर बरोबर पूर्व दिशेला असते. दरवर्षी २१ डिसेंबरला ती जागा पूर्वेपासून आग्नेय दिशेच्या बाजूला सुमारे २३ अंशावर असते. त्यानंतर सुरू झालेल्या उत्तरायणात ती रोज किंचित उत्तरेकडे म्हणजे डावीकडे सरकत २१ मार्चला बरोबर पूर्वेला असते आणि तशीच डावीकडे सरकत जात ती २१ जूनला पूर्वेपासून ईशान्येच्या दिशेच्या बाजूला सुमारे २३ अंशावर असते. २१ जूननंतर जूननंतर दक्षिणायन सुरू होते. त्यानंतर सूर्योदयाची जागा रोज किंचित उजवीकडे म्हणजेच दक्षिणेकडे सरकत २१ सप्टेंबरला बरोबर पूर्व दिशेला आणि २१ डिसेंबरला पुन्हा पूर्वेपासून आग्नेय दिशेच्या बाजूला सुमारे २३ अंशावर येते.  याप्रमाणे सूर्योदयाचे स्थान सुमारे ४६ अंशांच्या सेक्टरमध्ये आलटून पालटून मागेपुढे होत असते.

सूर्य आपल्या रोज बदलत जाणाऱ्या स्थानी उगवल्यानंतर आकाशात सरळ वर वर चढत दुपारी डोक्यावर येतो हा सुद्धा एक भ्रम आहे. फक्त विषुववृत्तावरच तो उभ्या रेषेत आकाशात वर चढत जातो. उत्तर गोलार्धात कुठेही पाहिल्याास आकाशातला सूर्याचा मार्ग दक्षिणेकडे कललेला वक्र दिसतो आणि दक्षिण गोलार्धात तो उत्तरेकडे कललेला दिसतो. उत्तर आणि दक्षिण ध्रुव प्रदेशात हे कलणे सुमारे ९० अंशापर्यंत वाढलेले असते त्यामुळे सूर्य क्षितिजालगतच फिरत राहिलेला दिसतो. वर्षामधील निरनिराळ्या तारखांना पुण्याच्या आकाशात सूर्य कसा तिरप्या रेषेत वर चढत जातो हे वरील आकृतीमध्ये दाखवले आहे.  तसेच दिल्ली, लंडन, केप टाउन, मेलबोर्न, विषुववृत्त, उत्तर ध्रुव या ठिकाणी होत असलेल्या सूर्याच्या भ्रमणाचा मार्ग तिरक्या रेखांमधून दाखवला आहे. उत्तर युरोपात सूर्याच्या रोजच्या आकाशामधील प्रवासाचा मार्ग कसा निरनिराळ्या वक्ररेषांमध्ये असतो हे एका आकृतीमध्ये दाखवले आहे. तिकडे डिसेंबर जानेवारीमध्ये होत असलेल्या फक्त पाचसहा तासांच्या दिवसात तो एक लहानशा कमानीसारख्या आकृतीमध्ये फिरतो तर जूनजुलैमधील अठरा एकोणीस तासांच्या दीर्ध दिवसात एका उंच कमानीमधून जात असला तरी तेंव्हादेखील तो झेनिथच्या दक्षिणेकडेच असतो, माथ्यावर कधी येत नाहीच. 

सूर्याचे हे दररोज पूर्वेकडून पश्चिमेकडे जातांना आपल्याला दिसणे हाच मुळी खरे तर एक भास असतो. तो आपल्या जागेवरच स्थिर असतो, पण पृथ्वी स्वतःभोवती गिरकी घेत असल्यामुळे आपण क्षणाक्षणाला वेगवेगळ्या कोणांमधून त्याला पहात असतो. पण आपल्याला पृथ्वी फिरतांना दिसत नाही, सूर्य, चंद्र आणि चांदण्याच आकाशमार्गे फिरतांना दिसतात. कदाचित यालाच संत ज्ञानेश्वरांनी "सूर्याचे न चालता चालणे" म्हंटले असेल. उत्तर आणि दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या रेषेभोवती पृथ्वी फिरत असते आणि ही पृथ्वीचा आंस २३ अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभरातून दर रोज निरनिराळे भाग सूर्यासमोर येत राहतात आणि त्या त्या ठिकाणी सूर्य माथ्यावर आलेला दिसतो.   

थोडक्यात सांगायचे झाल्यास २१ मार्च (वसंत संपात) आणि २३ सप्टेंबर (शरद संपात) या दोनच दिवशी जगभरात सगळीकडे सूर्य पूर्व दिशेला उगवलेला दिसतो आणि त्या दोनच दिवशी विषुववृत्तावर तो माध्यान्हीला डोक्यावर येतो. कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या पलीकडील प्रदेशात तो कधीच माथ्यावर येत नाही. इतर प्रदेशत म्हणजे ऊष्ण हवामानाच्या प्रदेशातल्या सर्व ठिकाणी तो वर्षामधील दोन दिवस दुपारी माथ्यावर येतो. विषुववृत्त सोडल्यास इतर सर्व ठिकाणी त्याचा आकाशातला मार्ग वक्र असतो.

यशिवाय सू्र्य दरवर्षातून एकदा सर्व राशींमधून फिरून येतांनाही दिसतो. सूर्याच्या या 'न चालता चालण्याचा' अंतर्भाव या लेखात केलेला नाही. अशा इतर माहितीसाठी हा लेख वाचावा. "सूर्याचे न चालता चालणे" https://anandghan.blogspot.com/2008/05/blog-post_11.html 




Friday, March 15, 2019

उत्क्रांति, उन्नति आणि अधोगति

परमेश्वर, खुदा किंवा गॉड यानेच या विश्वातली सर्व जीवसृष्टी निर्माण केली आहे, अर्थातच त्याने प्रत्येक जीवाचे सारे गुणधर्म पूर्ण विचारांती काही उद्देशाने ठरवले आहेत आणि हे सगळे मर्त्य मानवाच्या तुच्छ आकलनशक्तीच्या पलीकडे असते अशी शिकवण हिंदू, इस्लाम आणि ख्रिश्चन या प्रमुख धर्मांमध्ये दिली जाते. माणसाने फक्त त्या ईश्वरी चमत्काराकडे अचंभ्याने पहावे आणि त्या जगन्नियंत्याचे आभार मानावेत अशी अपेक्षा असते आणि बहुतेक माणसे शतकानुशतके तेच करत आली आहेत.

पण दोनशे वर्षांपूर्वी जन्मलेल्या डार्विन या शास्त्रज्ञाने यापेक्षा वेगळा विचार केला. त्याला लहानपणापासूनच निसर्गाचे निरीक्षण करण्याची प्रचंड आवड होती. त्याने आयुष्यभर जगभरातले पशुपक्षी, कीटक, वनस्पती वगैरेंचा सखोल अभ्यास केला. त्यासाठी तो एका जहाजाबरोबर तब्बल पाच वर्षे फिरून पृथ्वीप्रदक्षिणा करून आला. ते करतांना तो निरनिराळ्या खंडांमधल्या तसेच लहानमोठ्या बेटांवरल्या घनदाट अरण्यांमध्ये जाऊन राहिला आणि त्याने तिथले पशुपक्षी, कीटक आणि रानटी माणसे यांचे अगदी बारकाईने निरीक्षण केले. इतकेच नव्हे तर मिळतील तेवढी जुनीपुराणी हाडे, सांगाडे, कवट्या वगैरे अवशेष तो गोळा करत गेला आणि त्यांच्या सहाय्याने त्याने शेकडो किंवा हजारो वर्षांपूर्वी कुठे कशा प्रकारचे प्राणी किंवा माणसे असतील याचासुद्धा विचार केला. डार्विनने स्वतः तर संशोधन केलेच, त्याने इतर शास्त्रज्ञांची पुस्तके वाचून आणि त्यांच्याशी चर्चा करूनही या विषयामधले ज्ञान मिळवले आणि त्यावर चिंतन व मनन करून स्वतः काही पुस्तके लिहिली. त्यामधून त्याने क्रांतिकारक असे काही नवे सिद्धांत जगापुढे मांडले. 

डार्विन याने दीडशे वर्षापूर्वी मांडलेल्या मुख्य सिद्धांतानुसार जगामधील जीवांची उत्क्रांति (इव्हॉल्यूशन) होत होत त्यामधून नवनवे जीव निर्माण होत गेले आणि अशाच प्रकारे अखेरीस एप या माकडाच्या प्रजातीमधून मानवाची उत्पत्ती झाली. पुढे ही माणसे सर्व दिशांनी जगभर पसरत गेली तेंव्हा त्यांच्यात बदल होत होत निग्रो, पिग्मी, मंगोल, आर्य, द्रविड वगैरे निरनिराळे मानववंश तयार होत गेले. पृथ्वीवर जीवसृष्टीचा उगम झाल्यापासून अब्जावधि वर्षे ही उत्क्रांति सुरूच आहे आणि ती अनंत काळापर्यंत चालत राहणार आहे. ही उत्क्रांति कशा प्रकारे होत जाते याचाही एक ढोबळ विचार डार्विनने मांडला होता. त्याने असे सांगितले की प्रत्येक जीव आपल्यासारख्याच अनेक जीवांचे पुनरुत्पादन करत असतो, पण ते करतांना ते नवे जीव अगदी हुबेहूब त्याच्यासारखे न होता त्यात सूक्ष्म फरक होतात. यातले जे नवे जीव आजूबाजूच्या वातावरणाशी जास्त चांगले जमवून घेतात ते अधिक काळ टिकून राहण्याची जास्त शक्यता असते. जे जमवून घेऊ शकत नाहीत ते नष्ट होतात. डार्विनने या नियमाला 'सर्व्हायव्हल ऑफ दि फिटेस्ट' असे नाव दिले होते.

हे सिद्धांत मांडून डार्विनने प्रत्यक्ष परमेश्वरालाच जीवसृष्टीच्या निर्मितीच्या कामापासून बाजूला केले होते, ही गोष्ट त्या काळातल्या इंग्लंडमधल्या विद्वानांना मान्य होणे शक्यच नव्हते. यामुळे "मी जे काही सांगत आहे ते सगळेसुद्धा त्या महान परमेश्वराच्या मर्जीनेच होत असते" असे सांगून त्याने आपली तात्पुरती सुटका करून घेतली. त्या काळापर्यंत युरोपातली धर्मसत्ता थोडी शिथिल झाली होती त्यामुळे डार्विनचा छळ झाला नाही. शिवाय विज्ञानयुग सुरू झालेले होते आणि अनेक शास्त्रज्ञ स्वतंत्रपणे तर्कशुद्ध विचार करून ते धीटपणे मांडायला लागले होते. त्यातल्याही काही लोकांनी डार्विनला कडाडून विरोध केला, काही लोकांनी त्याला पाठिंबा देणारे आणखी पुरावे सादर केले आणि काहींनी त्याच्या सिद्धांतामध्ये सुधारणा सुचवल्या. काही काळातच डार्विनच्या विचारांना एकंदरीतपणे मान्यता मिळाली आणि ते विचार अजूनही ढोबळ मानाने स्वीकारले जातात. एवढेच नव्हे तर जीवशास्त्राशिवाय समाजशास्त्र, राजकारण किंवा अगदी मोटारी, विमाने किंवा काँप्यूटर्स यांच्याबद्दल बोलतांनासुद्धा उत्क्रांति किंवा इव्हॉल्यूशन या शब्दांचा उपयोग केला जातो इतके हे शब्द आता नेहमीच्या भाषेत रुळले आहेत. सुरुवातीच्या काळात अरण्यात हिंडत राहणाऱ्या आदिमानवाने घरे बांधून वस्ती केली, शेती आणि पशुपालन सुरू केले, असंख्य नवे नवे शोध लावून तो आपले जीवन अधिकाधिक सोयिस्कर करत गेला आणि आजही करत आहे.

भारतात मात्र डार्विनच्या सिद्धांताबद्दल मिश्र भावना आहेत. काही लोक श्रीविष्णूच्या दशावतारातसुद्धा उत्क्रांतीची चिन्हे शोधतात, पण तो एक अपवाद झाला. हिंदू पुराणांप्रमाणे ब्रह्मदेवाने प्रथम काही सर्वज्ञ ऋषी निर्माण केले आणि त्यांनी तिथून पुढे मानवांची प्रजा वाढवत नेली. त्यामुळे पंडित लोक स्वतःला साक्षात ब्रह्मदेवाचे वंशज समजतात. माकडाच्या उत्क्रांतीमधून माणूस जन्माला आला या डार्विनच्या सिद्धांताची आपल्याकडे नेहमी थट्टाच होत असते. एकाद्याच्या माकडचेष्टा पाहून "डार्विनच्या सिद्धांताचा पुरावा पहा" असे म्हणतील किंवा "तुझे पूर्वज माकडे असतील, माझे तर क्षत्रिय होते." असे मिशीला पीळ देऊन सांगतील.

"जुने ते सोने" असे म्हणत पूर्वीचा काळ आणि त्या काळातली परिस्थिती आणि माणसे किती चांगली होती अशा गोष्टी सांगण्यात रमणारे कित्येक लोक मला नेहमी भेटत असतात. रानावनात अन्न शोधत भटकत राहणाऱ्या आदिमानवापासून ते आजच्या युगातल्या आधुनिक राहणीमानापर्यंत मानवाने निश्चितच प्रचंड प्रगति केली आहे हेच त्यांना मान्य नसते. हिंदू धर्मशास्त्रात तर असे सांगितले आहे असे सांगितले जाते की सुरुवातीला सत्ययुगामध्ये सगळे आदर्श, प्रगत आणि आलबेल होते आणि ही परिस्थिती दर युगामध्ये बिघडत जाऊन आता घोर कलीयुग आले आहे आणि पुढे प्रलय होणार हे ठरलेले आहे. या क्रमात आदिमानवाचा उल्लेखही नाही. हा धार्मिक विचार उत्क्रांतीच्या कल्पनेच्याच अगदी विरुद्ध आहे आणि तो तावातावाने मांडणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.

त्यांच्या मते डार्विनचा सिद्धांत बरोबर असेल तर माणसाचीसुद्धा उत्क्रांति होत असायला हवी होती. आपल्या आयुष्यात थोडी प्रगति दिसत असली तरी ही सगळी फक्त भौतिक प्रगति आहे. आदिमानवांमध्येसुद्धा टोळीयुद्धे होत असत आणि आजचे लोक तरी तेच करत नाहीत का? मग त्यांच्या वागण्यात कसली डोंबलाची उत्क्रांति झाली आहे? असे प्रश्न विचारले जातात. "पुढच्या पिढीतल्या लोकांना काही ताळतंत्र उरला नाही, ते कसेही वाहवत चालले आहेत. त्यांचे काही खरे नाही." अशी कुरकुर मी माझ्या लहानपणापासून ऐकत आलो आहे. अशा काही शहाण्यांच्या मते तर माणसाची सतत अधोगतीच होत चालली आहे. त्यामुळे तो तर विनाशाच्या दिशेने चालला आहे. मग त्याच्या उत्क्रांतीचा प्रश्नच कुठे येतो?

मला असे वाटते की हा वाद घालणाऱ्या लोकांकडून उत्क्रांति या संकल्पनेकडून वेगळ्याच अपेक्षा केल्या जातात. त्या शब्दाचा थेट संबंध उत्कर्ष किंवा उन्नती यांच्याशी जोडला जातो. जे काही इव्हॉल्व्ह होईल ते उत्तमोत्तमच व्हायला हवे असे या लोकांना वाटते. पण प्रत्यक्षात डार्विननेही तसे सांगितले नव्हते. "सर्व सजीव पृथ्वीवर निसर्गनियमाने जन्माला येतात. ज्या सजीव जाती नैसर्गिक बदलांना तोंड देत उत्क्रांत होतात (जुळवून घेऊ शकतात) त्याच जाती काळाच्या ओघात टिकतात." असा त्याचा सिद्धांत आहे. दीडशे वर्षांपूर्वी त्याने सांगितलेला हा सिद्धांत अगही परिपूर्ण आहे असेही सगळे लोक मानत नाहीत. पण डार्विनला जाणवलेल्या Survival of the fittest या निसर्गाच्या तत्वानुसार टिकून राहण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमधून सर्वच जीवांची उत्क्रांती होत असते असेसुद्धा आपल्याला दिसते. उदाहरणार्थ रोगजंतूंमध्ये झालेली लक्षणीय उत्क्रांती आपल्या एका आयुष्यात आपल्याला दिसली आहे. अॅटीबायॉटिक्सना दाद न देणारे नवे बॅक्टीरिया रोज तयार होत आहेत. माणसाचे जीवनमान मोठे असल्यामुळे त्याची उत्क्रांति लक्षावधी वर्षे हळूहळू सुरू आहे. पण तिचा उद्देशसुद्धा आदर्श असा महामानव तयार करण्याच्या दृष्टीने नव्हे तर मानववंश टिकून राहण्याच्या दिशेनेच असणार. त्यासाठी संघर्ष अटळच असेल तर तो करणे आवश्यकच आहे आणि त्यात यशस्वी होण्याच्या दिशेनेच उत्क्रांति होत राहणार.

दोन माणसांमधील किंवा टोळ्यांमधील भांडणांची कारणे पहायला गेल्यास दोन प्रमुख कारणे दिसतात, आहे त्याहून अधिक काही मिळवण्याची हाव आणि आहे ते निसटून जाण्याची भीती. ही कारणे शिल्लक असेपर्यंत माणसामाणसांमधली भांडणे, मारामाऱ्या, युद्धे वगैरे अनेक प्रकारचे संघर्ष होतच राहणार. याशिवाय ईगो किंवा अहंभाव आहेच. या सगळ्या सहजप्रवृत्ती (इंन्स्टिंक्टिव्ह) आहेत. त्या प्राणिमात्रांच्या स्वसंरक्षणाचा भाग आहेत. त्या नाहीशा झाल्या तर कदाचित त्याचे अस्तित्वच धोक्यात येईल. त्यामुळे कुणाची आध्यात्मिक आणि आधिदैविक वगैरे प्रकारची उत्क्रांती झालीच तर ज्या माणसाला कसलाही संघर्ष करावाच लागत नाही अशा एकाद्या संपन्न आणि तत्वज्ञानी माणसाची होऊ शकेल, संपूर्ण मानवजातीची होऊ शकत नाही. बौद्धिक दृष्ट्या उत्क्रांत होऊन सगळे लोक सत्ययुगातल्यासारखे साधुसंत बनतील अशी अपेक्षा करता येत नाही. सत्ययुगामध्ये अशी परिस्थिती होती असे क्षणभर खरे मानले तरी त्या काळातसुद्धा दुष्ट असुर लोक होतेच आणि त्यांना कपटाने फसवून स्वतःसाठी अमृत मिळवणारे देव तरी किती सात्विक म्हणायचे? असल्या बिनबुडाच्या तर्काने उत्क्रांतीची कल्पना मोडीत निघत नाही.

यावर तुम्हाला काय वाटते?

Monday, February 18, 2019

तेथे कर माझे जुळती - भाग १८- श्रीकांत भोजकर



माझ्या आयुष्यात मला प्रत्यक्ष भेटलेल्या ज्या व्यक्तींबद्दल मला खूप आदर वाटला, ज्यांचा माझ्यावर प्रभाव पडला अशा लोकांची लहानशी व्यक्तीचित्रे मी 'तेथे कर माझे जुळती' या मथळ्याखाली माझ्या ब्लॉगवर चितारलेली आहेत आणि जी माणसे माझ्या मनाला चटका लावून हे जग सोडून गेली त्यांच्या आठवणी मी 'स्मृती सोडुनी जाती' या लेखमालेमध्ये लिहिल्या आहेत. गेला बराच काळ मी या दोन्ही विभागात नवे लेख लिहिलेच नव्हते. आता पुन्हा या मालिकांमध्ये भर घालणार आहे. मी आज ज्या व्यक्तीविषयी लिहायला घेतले आहे त्या माझ्या प्रिय मित्राबद्दल मला आदरही वाटतो, एके काळी त्याने माझ्या मनावर खूप प्रभाव टाकला होता, पण आता त्याच्या फक्त आठवणीच राहिल्या असल्यामुळे हुरहूरही वाटते. यामुळे त्याच्या आठवणींचा समावेश कोणत्या मथळ्याखाली करावा हा मलाही एक प्रश्नच पडला होता.

मी पुण्याच्या शासकीय इंजिनियरिंग कॉलेजात प्रवेश घेऊन त्यांच्या वसतीगृहात रहायला गेलो तेंव्हा प्रिन्सिपॉलपासून विद्यार्थ्यांपर्यत किंवा रेक्टरपासून मेसमधल्या वाढप्यापर्यंत त्या परिसरातली एकही व्यक्ती माझ्या ओळखीतली नव्हती. मी अचानक एका पूर्णपणे अनोळखी अशा जगात रहायला गेलो होतो आणि त्यामुळे मनातून थोडा भांबावलेलाच होतो. माझ्या खोलीत माझ्याच वर्गातली आणखी दोन मुले होती, त्यातला प्रदीप मुंबईहून आला होता आणि अशोक कोल्हापूरचा होता. त्या दोघांचेही पूर्वीपासूनचे काही मित्र आमच्या तसेच आधीच्या बॅचमध्ये शिकत असल्यामुळे ते दोघे नेहमी आपल्या मित्रांच्या कंपूत जाऊन बसायचे आणि मी थोडासा एकटा पडलो होतो, नवीन मित्र जोडण्याच्या प्रयत्नात होतो.

मी अशा अवस्थेत असतांना "तो काय म्हणतोय् काय की रेss, मी ते काय ऐकणार नै बsघss ..." असे काहीतरी माझ्या ओळखीचे हेल काढून मोठ्याने बोलत असल्याचे आवाज कानावर पडले. ते आवाज आजूबाजूच्या खोलीमधून येत होते म्हणून मी पहात पहात गेलो आणि मला त्या आवाजाचा मालक श्रीकांत भोजकर दिसला, मध्यम उंची पण पिळदार बांधा, तशाच पिळदार मिशा, भेदक नजर वगैरेनी युक्त असे रुबाबदार व्यक्तीमत्व असलेला मुलगा. त्याचे बोलणे झाल्यावर मी त्याला विचारले, "तू पणss बेळगावकडचा का रेss?" माझा अंदाज बरोबर होता. तो बेळगावचाच होता, पण दोन वर्षे फर्ग्युसन कॉलेजमध्ये राहिल्याने त्याच्या बोलीभाषेवर पुण्याचे संस्कार झाले होते. मी दोन वर्षे मुंबईत राहून आलो असल्यामुळे माझ्या जमखंडीच्या बोलीभाषेत बंबइया हिंदीतले धेडगुजरी शब्द घुसले होते, पण माझ्या बोलण्याची मूळची कानडी स्टाइल फारशी बदललेली नव्हती. आम्ही दोघे एकाच भागातले असल्याची खूण लगेच पटली आणि आमची अशी ओळख झाली. पुढे तिचे रूपांतर कधी गट्टीत झाले आणि 'मिस्टर भोजकर'चा 'भोज्या' होऊन गेला ते कळलेही नाही.

आमच्या भोज्याचा स्वभाव बोलका होता आणि त्याला सगळ्या बाबतीत आवडही होती आणि गतीही होती. त्यामुळे त्याच्याशी बोलायला विषयांची कमतरता नव्हतीच, मला त्याच्याशी संभाषण सुरू करण्यासाठी मुद्दाम काही करायची गरजच कधी पडली नाही. बहुतेक वेळा तोच काही ना काही मजेदार गोष्टी रंगवून सांगत असे. त्याला आमच्या लहानशा जगातल्या सगळ्या विषयांची माहिती असायचीच, त्यातल्या प्रत्येकावर त्याचे मत असायचे आणि त्यावर तो ठाम असायचा. काही बाबतीत तर हट्टीसुद्धा म्हणता येईल. रूढी परंपरांच्या काही बाबतीत तो जुन्या विचारांचा होता. तो शुद्ध किंवा कट्टर शाकाहारी होता. त्यासाठी त्याने पूर्णपणे शाकाहारी असलेल्या कर्नाटक क्लबच्या सेक्रेटरीशी कानडीमधून बोलून त्या मेसमध्ये प्रवेश घेतला होता. आधी संमिश्र स्वरूपाच्या महाराष्ट्र क्लबमधल्या सामिष पदार्थांची चंव पाहून घेतल्यानंतर भोज्याच्या ओळखीने मीसुद्धा कर्नाटक क्लबचा सदस्य झालो.

चीनबरोबर झालेल्या युद्धानंतरच्या त्या धामधुमीच्या काळात पाकिस्तानशीसुद्धा युद्ध होण्याची शक्यता दिसत होती आणि आम्ही कॉलेजात असतांनाच ते युद्ध झालेही. त्या काळातली परिस्थिती पाहता आम्हाला एन सी सी चे प्रशिक्षण कंपल्सरी केले होते. त्यानुसार आम्ही सगळ्यांनी परेड मैदानावर जाऊन हजेरी लावली. कमांडंटने सांगितले की सर्वांनी संपूर्ण चेहेऱ्याची चांगली गुळगुळीत दाढी करूनच परेडला यायला पाहिजे, म्हणजे मिशा सफाचट करायला हव्या होत्या. श्रीकांतला आपल्या पिळदार मिशांचा अभिमान तर होताच, पण वडील जीवंत असणाऱ्या मुलाने मिशा उतरवणे हे त्याच्या दृष्टीने अक्षम्य होते. त्याने या प्रॉब्लेमवरही मार्ग काढला. त्या वेळी नौदलाच्या एन सी सी ची वेगळी शाखा होती आणि त्या शाखेत दाढी ठेवली तर मिशा ठेवायला परवानगी होती. भोज्याने लगेच त्या शाखेत नाव नोंदवले आणि जितका काळ एन सी सी चे ट्रेनिंग होते तितका काळ तो सरदारजी होऊन राहिला होता. 

त्याच्या अंगात उपजतच भरपूर नेतृत्वगुण होते. त्यामुळे तो पाहता पाहता आपसूकच आम्हा सर्वांचा लीडर बनला. दोन मुलांमधले भांडण मिटवायचे काम असो किंवा रेक्टरकडे जाऊन कसली तक्रार करणे असो सगळ्यांची नजर भोजकरकडे जाई आणि तो पुढाकार घेऊन ते काम यशस्वीपणे तडीला लावून देत असे. त्याने निवडणूक लढवली असती तर कुठलेही पद त्याच्याकडे सहज चालून आले असते, पण हातात घेतलेले कोणतेही काम मन लावून लक्षपूर्वक करायचे अशी सवय त्याला होती आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल अशी कुठलीही जास्तीची जबाबदारी अंगावर घ्यायची नाही यावर तो ठाम होता.

कॉलेजच्या तीन वर्षांच्या काळात हॉस्टेलमधल्या ज्या सात आठ मित्रांचा आमचा एक ग्रुप तयार झाला होता त्यात भोजकर नैसर्गिक लीडर होता. नेहमीचे डेक्कनवर फिरायला जाणे असो किंवा हॉटेलमध्ये (शाकाहारी) खाद्यंती, रेडिओवरली गाणी ऐकणे, कधी नाटकसिनेमा, लहानशी पिकनिक, पत्त्यांचा अड्डा जमवणे, सबमिशन्सचे काम उरकणे असो, किंवा नुसताच हसतखिदळत टाइमपास करणे असो या सगळ्यांमध्ये त्याचा उत्साह असायचाच आणि तो इतरांनाही सोबत घेऊन, कधी कुणाला डिवचून तर कधी धीर देऊन सगळ्यांना कामाला लावायचा. पुढे जाऊन इनिशिएटिव्ह, ड्राइव्ह, मोटिव्हेशन वगैरे मॅनेजमेंटमधले शब्द ऐकतांना माझ्या नजरेपुढे भोजकरचे उदाहरण लगेच उभे रहात असे. सकारात्मक विचार आणि धडाडी या गुणांचे वस्तुपाठ त्याच्या वागण्यामधून मिळत होते. अशा मित्रांमुळेच आमच्या इंजिनियरिंगच्या शिक्षणाची खडतर तपश्चर्येची वर्षे बरीच सुखावह झाली होती.

१९६६ मध्ये माझे इंजिनियरिंग कॉलेजातले शिक्षण संपले आणि मी नोकरीसाठी मुंबईला जाऊन तिथे स्थायिक झालो. त्या काळात संपर्काची काही साधनेच नव्हती. हॉस्टेलमधल्या मित्रांचे परमनंट अॅड्रेस नसायचेच, माझ्याप्रमाणेच ते सगळेही नोकरी मिळेल तिकडे जाणार हे ठरलेलेच होते. मग त्यांच्याशी पत्रव्यवहार करायचा तरी कसा करायचा? आमच्यातल्या कुणाकडेच टेलीफोनही नव्हते आणि त्या काळात ते लगेच मिळण्याची सुतराम शक्यताही नव्हती. त्यामुळे अचानक कोणीतरी एकादा कॉलेजातला मित्र प्रवासात किंवा सिनेमा थिएटरात अशा ठिकाणी भेटला तर त्याच्याशी थोडे बोलणे व्हायचे आणि त्याला अशाच कुठेतरी भेटलेल्या इतर मित्रांची खबरबात त्याच्याकडून कळायची. अशा प्रकारे पहिली दोन तीन वर्षे मला भोजकरबद्दल थोडी उडती माहिती मिळत गेली आणि नंतर तीही मिळणे कमी कमी होत थांबले. या अथांग दुनियेत तो कुठे रहात होता, काय करत होता याचा मला मागमूसही लागत नव्हता.

मी सेवानिवृत्त झाल्यानंतर नव्या मुंबईत घर घेतले होते. तिथे आजूबाजूला काही नवेजुने मित्र रहात होते ते नेहमी मला भेटत असत. तोपर्यंत इंटरनेट सुरू झाल्यामुळे माझे अनेक मित्र आधी ईमेलमधून आणि नंतर ऑर्कुट, फेसबुक वगैरेतून संपर्कात राहिले होते, पण ते सगळे मला नोकरीच्या अखेरच्या काळात भेटलेले होते. शाळा आणि कॉलेजमधला माझा कोणताच मित्र माझ्या या नव्या संपर्कमाध्यमांच्या कक्षेत अजून आला नव्हता. दहा वर्षांनी मी पुण्याला स्थलांतर केल्यावर मुंबईतल्या मित्रांचे प्रत्यक्ष भेटणे थांबले आणि एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्यासाठी पुण्यात स्थायिक झालेले माझे जुन्या काळातले कोणते मित्र आता कुठे भेटतील याचा शोध मी सुरू केला.

जेंव्हा श्रीकांत भोजकर आता पुण्यातच राहतो हे मला समजले तेंव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्याला भेटायची प्रचंड उत्कंठा मला लागली आणि तो योगही लगेचच आला. आम्ही इंजिनियरिंग कॉलेजमधून केलेल्या निर्गमनाला पन्नास वर्षे पूर्ण होण्याचा सुवर्णमहोत्सव समारंभपूर्वक साजरा करायचे माझ्या काही मित्रांनी ठरवले आणि त्यासाठी पुण्यातल्या सगळ्या बॅचमेट्सची एक बैठक मल्टीस्पाइस हॉटेलमध्ये ठेवली गेली. मी त्या मीटिंगला आवर्जून हजेरी लावली आणि यापूर्वी मी ज्यांना विशीमध्ये पाहिले होते असे पण आता सत्तरीमध्ये गेलेले अनेक मित्र एकसाथ भेटले. त्यातल्या ज्याला मी अगदी सहजपणे ओळखू शकलो तो श्रीकांत भोजकरच होता. त्या कार्यक्रमानंतर आम्ही एकमेकांची थोडी विचारपूस केली आणि पुन्हा भेटायचे ठरवून निरोप घेतला. त्या काळात मी स्वतः बिकट परिस्थितीमधून जात होतो त्यामुळे भोजकरच्या घरी जाऊन त्याला भेटणे मला शक्य झाले नाही, पण आम्ही टेलीफोनवरून अनेक वेळा बातचित केली, ई मेल, फेसबुक आणि वॉट्सॅपवरून संदेशांची देवाणघेवाण करीत राहिलो.

त्याच्या बोलण्यावरून मला असे समजले की भोजकरने आधीची काही वर्षे इंजिनियरिंगच्या क्षेत्रात काम केले आणि त्यामधून तो मॅनेजमेंटकडे वळला. पण दुसऱ्याची चाकरी करून तो सांगेल ते काम करण्यापेक्षा स्वतः शिक्षक होऊन इतरांना ज्ञानदान करणे श्रेष्ठ आहे असे त्याच्या मनाने घेतले आणि तो जीवनाचे रूळ बदलून शिक्षणक्षेत्रात गेला. तो जिथे जाईल तिथे त्याच्या अंगभूत गुणांमुळे तो चमकणार तर होताच. त्याने या क्षेत्रातही थेट आंतरराष्ट्रीय पातळी गाठली आणि जगभरातल्या अनेक देशांमध्ये दौरे करून व्याख्याने दिली, कार्यशाळा चालवल्या आणि त्यातून असंख्य मॅनेजर्सना प्रशिक्षण दिले होते. तो कुणाकडे नोकरी करीत नसल्यामुळे सक्तीच्या सेवानिवृत्तीचा प्रश्न नव्हता आणि आपले आवडते विद्यादानाचे व्रत सत्तरीमध्ये गेल्यावरसुद्धा जमेल तेवढे चालवतच राहिला होता. यामधून त्याचे अनेक चाहते निर्माण झाले होते आणि त्याचा लोकसंग्रह वाढतच होता.

सदानंद पुरोहित याने आमच्या बॅचच्या सुवर्णमहोत्सवासाठी पुढाकार घेऊन कामातला सिंहाचा वाटा उचलला होता, त्यासाठी तो रात्रंदिवस प्रचंड धडपड करीत होता, पण त्याच्या पाठीवर हात ठेऊन "तू पुढे हो, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत" असे त्याला सांगणाऱ्यांमध्ये श्रीकांत भोजकर प्रमुख होता. या कामासाठी सर्वानुमते जी समिति संगठित केली गेली होती तिचे अध्यक्षपण सहजपणे त्याच्याकडे आले होते आणि आपल्या दीर्घ अनुभवाचा उपयोग करून घेऊन तो समितीतल्या कार्यकर्त्यांना सतत योग्य मार्गदर्शन करत होता आणि त्यांच्या कामात सक्रिय सहभागी होत होता.

सुवर्णमहोत्सवाचा कार्यक्रम होऊन गेल्यानंतरसुद्धा पुण्यात राहणाऱ्या काही मित्रांनी एकमेकांना भेटण्यासाठी दर तीनचार महिन्यांमधून एकदा ब्रेकफास्ट मीटिंग करायची असे ठरवले आणि त्यातल्या पहिल्या एक दोन मीटिंग्जना भोजकरसुद्धा नेहमीच्या उत्साहाने हजर राहिला आणि आपल्या बोलण्यामधून त्याने रंग भरला. त्या दरम्यान आमच्या दोघांचाही कॉलेजमधला जवळचा मित्र असलेल्या कृष्णा कामतचा पत्ता मला लागला. तो बारा वर्षे आखाती प्रदेशात राहून नुकताच भारतात परत आला. त्याला मी आमच्या ब्रेकफास्ट मीटिंगबद्दल फोनवरून सांगितले आणि तो आला तर भोजकरसह आणखी काही जुन्या मित्रांची एकत्र भेट होईल असे आमिष दाखवले. त्याने यायचे लगेच कबूल केले आणि ठरल्याप्रमाणे तो पुण्याला आलासुद्धा.

पण त्या दिवशी भोजकर मात्र त्या मीटिंगला येऊ शकला नाही. मग मी त्याच्या घराचा पत्ता विचारून घेतला आणि कामतसह दोन मित्रांना सोबत घेऊन त्याचे घर गाठले. आम्ही त्याच्या घरी गेलो त्या वेळी तो खाटेवर झोपून राहिलेला नव्हता किंवा गंभीर आजारी असल्यासारखा वाटतच नव्हता, वरवर तरी तो तसा ठीकच दिसत होता. फक्त त्याने कंबरेला पट्टा बांधलेला होता आणि पाठीच्या कण्याला धक्का लागून त्रास होऊ नये म्हणून तो बाहेर हिंडत फिरत नव्हता असे त्याने सांगितले. वयोमानानुसार असा तात्पुरता त्रास अनेक लोकांना झालेला मी पाहिला होता म्हणून आम्हीही त्याला "चार दिवस आराम कर, मग सगळे ठीक होऊन जाईल." असे सांगितले. आम्हाला भेटून त्यालाही खूप आनंद झाला. आम्ही दीड दोन तास छान गप्पा मारल्या, पन्नास वर्षांपूर्वीचे हॉस्टेलमधले दिवस आठवून त्या वेळच्या अनेक मजेदार घटनांची उजळणी केली तसेच सध्याच्या परिस्थितीवर आणि पुढे काय काय करायचे प्लॅन आणि विचार आहेत यावरही थोडी हलकीफुलकी चर्चा केली. आता आमच्या जुन्या मैत्रीचे धागे पुन्हा जुळायला सुरुवात झाली होती.

पन्नास वर्षांमध्ये भोजकरच्या मूळच्या उत्साही, सकारात्मक आणि हंसतमुख वृत्तीत काहीच फरक पडला नव्हता, तसेच आपल्या मतावर ठाम असण्याचा गुणही तसाच होता. फक्त दुसऱ्या कोणी विरुद्ध मत मांडलेच तर तो आता त्यावर वाद न घालता "जय जय रघुवीर समर्थ" किंवा "जेजेआरएस" असे म्हणून वादाला तिथेच पूर्णविराम द्यायला लागला होता. तो वॉट्सॅपवर काही धार्मिक स्वरूपाच्या पोस्ट टाकत असे ते पाहता त्याच्या धार्मिक वृत्तीत किंचित वाढ झाली असावी.  टेलीफोन उचलल्यावर तो हॅलो न म्हणता "जय जय रघुवीर समर्थ" असे बोलायचा आणि संभाषणाची अखेरही त्या घोषवाक्याने करायचा. त्याची ही नवी लकब आता माझ्या कायम लक्षात राहणार आहे आणि त्याची आठवण करून देणार आहे.

पण त्यानंतरच्या आमच्या कुठल्याच ब्रेकफास्ट मीटिंगला तो येऊ शकला नाही. पण तो यारोंका यार होता. त्याला मित्रांबरोबर चार घटका हंसतखेळत घालवायची दांडगी हौस होती. परगावाहून किंवा परदेशामधून आलेला आमचा एकादा मित्र त्याच्या घरी जाऊन त्याला भेटून यायचा आणि त्या भेटीची छायाचित्रे भोजकर स्वतःच वॉट्सॅप किंवा फेसबुकवर टाकायचा, असे दर महिन्या दोन महिन्यातून एकदा तरी होतच असे. त्या फोटोतला त्याचा हंसरा चेहेरा पाहून त्याची तब्येत चांगली प्रगतिपथावर आहे असेच वाटायचे. त्याशिवाय सोशल मीडियावरून त्याचे इतर मेसेजेसही नेहमी येतच होते. मुळात त्याला एकादे गंभीर स्वरूपाचे दुखणे झाले होते हेच मला कित्येक महिने समजले नव्हते. दर मीटिंगच्या दिवशीसुद्धा "तो आज येणार आहे" असे कोणीतरी सांगायचा आणि सगळे खूश व्हायचे, त्याला जिने चढायची दगदग करावी लागू नये म्हणून आम्ही माडीवरच्या हॉलमध्ये न जाता खालच्या लॉनमध्ये जमायचो, पण वाट पाहून त्याला फोन केल्यावर तो या वेळी येऊ शकणार नाही असे समजत असे. असेही दोन तीन वेळा झाले.

त्याचे दुखणे म्हणजे वयोमानामुळे आलेली साधी पाठदुखी नसून त्याचे प्रोस्टेट ग्रंथींचे ऑपरेशन झाले असल्याचे मला बऱ्याच काळानंतर कळले. पण त्याच सुमाराला आमच्या दुसऱ्या एका मित्राचे तशाच प्रकारचे ऑपरशन झाले होते आणि तो तीनचार महिन्यात चांगला हिंडूफिरू लागला होता एवढेच नव्हे तर परदेशी जाऊन आला होता हे समजल्यामुळे मी भोजकरबद्दल निश्चिंत होतो. फक्त त्याला पूर्ववत धडधाकट व्हायला आणखी किती अवधी लागतो याची वाट पहात होतो.

मध्येच एकदा त्याला पुनः हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्याचे समजले आणि आता मात्र त्याला भेटून यायलाच हवे असे मी आपल्या मनाशी ठरवले. पण आज, उद्या, परवा करता करता मधले काही दिवस निघून गेले आणि एका सकाळी अचानकपणे तो आपल्यात राहिला नसल्याची धक्कादायक वार्ताच समजली. या वेळी आम्ही सगळे मित्र त्याच्या घरी जमलो ते त्याचे अंतिम दर्शन घेऊन साश्रु निरोप देण्यासाठी. तो तर आता काहीच बोलू शकत नव्हता, पण त्याने आम्हाला "जय जय रघुवीर समर्थ" असे म्हणूनच आमचा निरोप घेतला असणार असे मला वाटून गेले.