Tuesday, December 14, 2010

मन (भाग २)

आपल्या मनात उठणा-या निरनिराळ्या भावनांमध्ये प्रेम ही सर्वात उत्कट असते. त्यामुळेच संवेदनशील कवीमनाला ती सर्वात जास्त भुरळ पाडते. या भावनेचीच अगणित रूपे त्यांनी आपल्या रचनांमधून दाखवली आहेत. प्रेमाचा अंकुर मनात कधी फुटला हे एका प्रेमिकेला समजलेसुध्दा नाही. ते जाणता अजाणता घडून गेले, कसे ते पहा. या ठिकाणी हृदय या शब्दाचा अर्थ फक्त मन असाच होऊ शकतो. शरीरविज्ञानातल्या हृदयात चार मोकळे कप्पे असतात आणि ते आळीपाळीने आकुंचन व प्रसरण पावून त्यातून रक्ताभिसरणाचे कार्य करत असतात. प्रीतीच्या किंवा कुठल्याही भावना अज्ञात अशा मनातच जागतात.

राजहंस सांगतो कीर्तिच्या तुझ्या कथा ।
हृदयि प्रीत जागते जाणता अजाणता ।।

पाहिले तुला न मी तरीहि नित्य पाहते ।
लाजुनी मनोमनी उगिच धुंद राहते ।
ठाउका न मजसी जरी निषद देश कोणता ।।

दिवसरात्र ओढणी या मनास लागते ।
तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते ।
मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता ।।

निमंत्रणाविना पुन्हा हंस येइ तो वनी ।
नादचित्र रेखीतो तुझेच मंद कूजनी ।
वेड वाढवून तो उडून जाय मागुता ।।
हृदयि प्रीत जागते जाणता अजाणता ।।

पण तो अंकुर वेगाने वाढत जातो आणि त्यातून मन मोराचा सुंदर पिसारा फुलतो. तेंव्हा ती प्रेमिका म्हणते.

बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला।

रे मनमोरा, रंगपिसारा, अंगी रंगूनी जीव रंगला।
गोजिरवानी, मंजुळ गाणी, वाजविते बासरी डाळिंब ओठाला।
येडं येडं, मन येडं झालं, ऐकुन गानाला ।।

हे वेडावलेले मन आपल्या मनातले गुपित कुणाला तरी सांगून टाकायला आसुसलेले असते, पण तसे करायची त्याला लाजही वाटत असते. आपल्याला नक्की काय झाले आहे असा संभ्रमही त्याला पडत असतो. जे काहीतरी झाले आहे ते शब्दात कसे व्यक्त करायचे असा प्रश्नसुध्दा त्याला पडतो. ते स्वतःलाच विचारते,

काय बाई सांगू ? कसं गं सांगू ?
मलाच माझी वाटे लाज ।
काही तरी होऊन गेलंय आज !

उगीच फुलुनी आलं फूल ।
उगिच जीवाला पडली भूल ।
त्या रंगाचा, त्या गंधाचा ।
अंगावर मी ल्याले साज ।
काही तरी होऊन गेलंय आज !

जरी लाजरी, झाले धीट ।
बघत रहिले त्याला नीट ।
कुळवंताची पोर कशी मी ।
विसरुन गेले रीतरिवाज ?
काही तरी होऊन गेलंय आज !

सहज बोलले हसले मी ।
मलाच हरवुन बसले मी ।
एक अनावर जडली बाधा ।
नाहि चालला काही इलाज ।
काही तरी होऊन गेलंय आज !


हे तसे अजून तरी एकतर्फी प्रेम आहे. पण ते मनात नवीन इच्छा आकांक्षा निर्माण करते आणि त्यांची पूर्ती होण्यासाठी त्याला तसाच प्रतिसादही मिळायलाच हवा ना ! पण हे कसे घडणार ? आपल्या मनातल्या भावना दुस-या कोणाला सांगण्याआधी ते मन स्वतःलाच विचारते,

मी मनात हसता प्रीत हसे ।
हे गुपित कुणाला सांगु कसे ?

चाहुल येता ओळखिची ती ।
बावरल्यापरि मी एकांती ।
धुंद जिवाला डोळ्यांपुढती ।
नव्या नवतिचे स्वप्न दिसे ।।

किंचीत ढळता पदर सावरी ।
येता जाता माझि मला मी ।
एक सारखी पाहि दर्पणी ।
वेड म्हणू तर वेड नसे ।।

काहि सुचेना काय लिहावे ।
पत्र लिहू तर शब्द न ठावे ।
नाव काढिता रूप आठवे ।
उगा मनाला भास असे ।।

सांगायला जावे तर आवाज फुटत नाही, लिहायला शब्द सुचत नाही म्हणून प्रेमिका एक आगळा मार्ग शोधून काढते. आपल्या मनातल्या अस्फुट भावना प्रि.कराला कळाव्यात म्हणून प्रेमिका सांगते

डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे ।
साजाविना कळावे संगीत लोचनांचे !

मी वाचले मनी ते, फुलली मनात आशा ।
सांगावया तुला ते नाही जगात भाषा !
हितगूज प्रेमिकांचे, हे बोल त्या मुक्यांचे ।।

हास्याविना फुटेना ओठांत शब्द काही ।
कळले सखे तुला ते, कळले तसे मलाही ।
दोघांस गुंतवीती, म‍उ बंध रेशमाचे ।।

पद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या ।
या जीवनात काव्ये, काव्यात जीवने या !
गंधात धुंद वारा, वा-यात गंध नाचे ।।

थोडी धिटावलेली आणि कल्पक प्रेमिका काव्यमय भाषेत विचारते.

हृदयी जागा, तू अनुरागा, प्रीतीला या देशील का ?

बांधिन तेथे घरकुल चिमणे, स्वर्गाचे ते रूप ठेंगणे
शृंगाराचे कोरीव लेणे, रहावयाला येशील का ?

दोन मनांची उघडी दारे, आत खेळते वसंत वारे
दीप लोचनी सदैव तू रे, संध्यातारक होशील का ?

घराभोवती निर्झर नाचे, जाणुन अपुल्या गूढ मनाचे
झाकुन डोळे एकांताचे, जवळी मजला घेशील का ?



. . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: