Thursday, October 23, 2008

आजीचे घड्याळ - भाग १० पंचांगाची उपयुक्तता

"निसर्गातल्या, विशेषतः आकाशात घडणा-या घटनांचा उपयोग करून वेळ मोजण्याचं एवढं किचकट शास्त्र विद्वान लोकांनी बनवलं खरं. पण ज्योतिषांना सोडून इतर सामान्य माणसांना त्याचा काय उपयोग झाला?" मिस्टरांनी विचारलं.
मी म्हंटले,"माझ्या मते भाषा आणि गणित यांच्यानंतर कालगणना हा माणसाच्या विज्ञानसाधनेतला एक सर्वात महत्वाचा पायाभूत भाग म्हणता येईल. वस्तुमान, अंतर आणि काल या तीन मूलभूत तत्वांच्या परिमाणांच्या गुणाकार, भागाकारातून विज्ञानातील बाकीची सर्व असंख्य सूत्रे बनली आहेत. या तीन तत्वांच्या सखोल अभ्यासामधून आजचा विज्ञान व तंत्रज्ञानाचा डोलारा उभा राहिला आहे. विज्ञान हे सुद्धा विशेषज्ञांचे क्षेत्र झाले असे कदाचित तुम्ही म्हणाल.
आपण तुमचीच गोष्ट घेऊ. तुमची आणि तुमच्या कुटुंबातील इतर व्यक्तींची जन्म तारीख, लग्नाची तारीख, नववर्षदिन, भारताचा स्वातंत्र्यदिवस अशा कितीतरी तारखा तुमच्या दृष्टीने महत्वाच्या असतील. आजकाल दसरा, दिवाळी, पाडवा यासारखे आपले सणसुद्धा कॅलेंडरवर लाल रंगात दाखवलेले असतात तेच आपण पाहतो. पण जर हे कॅलेंडरच अस्तित्वात नसते तर केवढा गोंधळ झाला असता? तुम्हाला घरातल्या लोकांची वये किती आहेत हे देखील समजले नसते. तुमचं शिक्षण कधी आणि किती काळ झालं? नोकरी वा व्यवसाय केंव्हा सुरू केला? त्यात पदोन्नतीसारख्या महत्वाच्या घटना कधी घडल्या? तुमच्यावर कोणती संकटे कधी येऊन गेली? आनंदाचे क्षण देणा-या गोष्टी कधी घडल्या? यातले कांहीसुद्धा समजले नसते. हांतावर पोट असणा-या लोकांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात त्यामुळे कदाचित फार फरक पडणार नाही. पण त्या जाणीवांमुळे जीवनाला एक उंची प्राप्त होते. आपण भूतकाळातील घटनांवर
सविस्तर विचार करून त्यातून धडे घेऊ शकतो. भविष्यकाळात करण्यासाटी कांही नियोजन करू शकतो. त्यासाठी आवश्यक असलेले इंग्रजी कॅलेंडर आपल्याकडे घरोघरी फार तर शंभर वर्षापूर्वी आले. त्यापूर्वी पंचांगच होते. छापखाने नसल्यामुळे तेही घरोघरी नसेल, पण आभाळात दिसणारे ग्रहता-यांचे पंचांग आणि घड्याळ तर सर्वांना सहज उपलब्ध होते. आपापल्या कुवतीप्रमाणे त्याचा उपयोग ते करून घेत होते.

घडून गेलेल्या गोष्टी स्मरणामध्ये सुट्या सुट्या राहतात. त्या कधी आणि कोणत्या क्रमाने घडल्या हे समजले तर त्यांची सांखळी बनवून त्यातून अर्थपूर्ण निष्कर्ष काढता येतात. ब-याच गोष्टींची
पुनरावृत्ती होत असते. पूर्वीचा इतिहास माहीत असेल तर पुढे काय होऊ शकते याची कल्पना येते. पेरणी केल्यानंतर कधी पीक येईल, कुठल्या झाडांना कुठल्या मोसमात फळे लागतील, वयाप्रमाणे मुलांची वाढ कशी होईल अशासारख्या अनंत गोष्टी वेळेनुसार घडत असतात. यामुळे कालगणनेचं महत्व माणसाला आपोआप समजतं. त्याची एक पद्धत निर्माण झाल्यावर त्याचा उपयोग करून जन्म मृत्यू यासारख्या महत्वाच्या गोष्टींची नोंद करण्याची वहिवाट सुरू झाली. पंचांग, कॅलेंडर असे कांहीच नसेल तर त्यात किती मर्यादा येतात ते मी सांगितलेच आहे.
व्यक्तीगत आयुष्य असो वा सर्व समाजावर परिणाम करणा-या घटना असोत, नैसर्गिक असोत वा मानवनिर्मित असोत, त्या घटना कधी घडल्या किंवा घडणार आहेत हे समजणे अत्यंत महत्वाचे आहे हे बहुतेक शहाण्या लोकांना पटले आणि अनेक प्रकारांनी तशा नोंदी ठेवल्या गेल्या."

"पण आपली ही तिथी नक्षत्र वगैरेची जटिल पद्धती सामान्य लोकांना कशी समजली?" त्यांनी रास्त शंका काढली.

मी उत्तर दिले,"एकादी गोष्ट पुन्हा पुन्हा कानावर पडली तर पूर्णपणे नाही तरी थोडी थोडी समजायला लागते. यासाठी एक छान युक्ती काढली होती. आपल्या प्रत्येक पूजेच्या धार्मिक विधीमध्ये सुरुवातीलाच ... नाम संवत्सरे, ..ऋतौ, .. मासे, ..पक्षे, ..शुभपुण्यतिथौ असे म्हणत त्या दिवसाची पूर्ण माहिती देऊन पुढे चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे, सूर्य, गुरु, शनी वगैरे ग्रह कोणत्या राशीमध्ये आहेत या सगळ्यांचा उच्चार करायची प्रथा पाडली गेली. त्यामुळे ती सांगणा-या पुरोहिताला तर एवढी अद्ययावत माहिती ठेवणे भाग पडत असे आणि निदान तेवढा अभ्यास करणारा एक वर्ग निर्माण झाला. तो पूजाविधी पाहणा-या लोकांनाही ती माहिती आपोआप कळत असे. अशा प्रकाराने त्या माहितीचे प्रसरण होत होते. मोटार कशी बनवायची हे
ज्ञान ऑटोमोबाईल इंजिनियरला असलं तरी ती कशी चालवायची एवढं सर्वसामान्य माणूस शिकून घेतो. त्याचप्रमाणे महिना तिथी ऋतु एवढ्या गोष्टी कशा निर्माण झाल्या हे माहीत नसलं तरी त्यांची जुजबी माहिती सर्वसामान्य लोकांना मिळत होती.

ती माहिती आणखी पक्की व्हावी यासाठी अनेक उत्सवांचे दिवस तिथीनुसार ठरवले गेले. 'सहा ऋतूंचे सहा सोहळे' त्या त्या कालावधीत कधीही साजरे करता आले असते. पण यात सर्व समाजाचा एकाच वेळी सहभाग होण्यासाठी विशिष्ट दिवशी सणाद्वारे ते साजरे करण्याची प्रथा रूढ झाली. यातील प्रत्येक सणाच्या दिवसाच्या निमित्ताने त्या काळामधल्या महिना व तिथी यांची उजळणी होत राहिली. अशा प्रकाराने आपल्या पूर्वजांनी फक्त कालगणनेची पद्धती निर्माण केली एवढेच नव्हे तर आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास त्यांनी 'लॉँच' केलेल्या या 'प्रॉडक्ट'चे यशस्वीरीत्या 'मार्केटिंग' केले."

. . . . . . . . . .. . . . . . .(क्रमशः)

No comments: