Friday, November 14, 2014

स्मृती ठेवुनी जाती १२ - नाना बिवलकर

आम्ही अणुशक्तीनगरातल्या सरकारी वसाहतीत रहायला गेलो तेंव्हा आमच्या इमारतीतले साठपैकी साठ रहिवासी सायंटिस्ट किंवा इंजिनियर होते. इतकेच नव्हे तर आजूबाजूच्या तीन चार बिल्डिंगमध्येसुद्धा तीच परिस्थिती होती. आमच्यासाठी हा नवा अनुभव होता. लहान गावातल्या संमिश्र वस्तीत सोनार, शिंपी, गवंडी, गवळी, डॉक्टर, वकील, पुजारी, भटजी वगैरे सगळ्या प्रकारचे लोक रहात असायचे आणि ते कुठे राहतात हे सगळ्या गावाला ठाऊक असायचे. ज्या माणसाकडे आपले काही काम असेल तो माणूस तिथे सहजपणे भेटत असे. पण इथे कोणाचाच पत्ता कोणालाही माहीत नव्हता. आमच्या नव्या घरासाठी सामान आणून आणि लावून झाल्यानंतर मुंबईतल्या नातेवाइकांना काही निमित्याने बोलावून आमचे घर दाखवायचे होते. त्यासाठी आणि नव्या घरात रहायची सुरुवात मंगलमय वातावरणात व्हावी म्हणून एक सत्यनारायणाची पूजा करावी असा विचार आमच्या मनात आला. पण त्यासाठी कोणकोणते सामान लागते, ते कुठे मिळते आणि ती पूजा कोण सांगणार वगैरे समजत नव्हते. आमच्या हिंदी भाषिक शेजा-यांनी एका देवळातल्या गुजराथी पूजा-याला बोलावून पूजा, होमहवन वगैरे करवून घेतले, पण ते काही आम्हाला पसंत पडले नाही. अशाच दुस-या एका देवळातल्या एका मराठी पूजा-याला बोलावून आम्ही पूजा करवून घेतली, पण आम्ही मुंबईत नवखे असल्यामुळे लुबाडायला चांगले गि-हाईक आहोत असे त्याला वाटले असावे आणि देवाधर्माच्या कामात घासाघीस करणे आम्हाला प्रशस्त वाटले नाही. पण तो अनुभव काही मनाला फारसा भावला नाही. नंतरच्या काळात ओळखी पाळखीमधून आणखी कोणाकोणाला बोलावून पूजा करायचे प्रयत्न आम्ही केले, पण आम्हाला सोयिस्कर अशा दिवशी त्यांना वेळ नसायचा आणि ते येऊ शकत असतील त्या दिवशी आम्हाला काही अडचण असायची असे दोन चार वेळा झाले. त्या काळात आमच्याकडेही फोन नव्हता आणि सेलफोनचा शोधही लागला नव्हता. त्यामुळे त्या पुरोहितांशी संपर्क साधणेही बरेच कठीण असायचे.

अशा प्रकारची आमची शोधाशोध चालली असतांनाच "एकदा आपल्या नाना बिवलकरांना विचारून पहा ना." असे कुणीतरी सांगितले. मी लगेच त्यांचा पत्ता मिळवला आणि वहीत लिहून ठेवला. त्यानंतर जेंव्हा आम्हाला पूजा करायची होती त्या वेळी त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटलो. मी स्वतःची ओळख करून दिली, "मी घारे, आम्ही नंदादेवीमध्ये राहतो. मी पीपीईडीत नोकरीला आहे."
"हां, तुम्हाला कॉलनीत पाहिल्यासारखे वाटते आहे. मी काकोडकरांबरोबर काम करतो." नाना.
ते ऐकून मी चपापलोच. त्या काळातही श्री.अनिल काकोडकर बीएआरसीमध्ये मोठ्या पदावर होते. त्यांच्याबरोबर काम करणारे कोणी सामान्य असणार नाहीत. बिवलकर रहात होते त्या बिल्डिंगमध्येही माझ्या ओळखीतले काही इंजिनियर रहात असत, म्हणजे हे सुद्धा बहुधा ऑफीसर असणार, वयाने माझ्याहून दहा बारा वर्षे मोठे होते, म्हणजे ते चांगल्या पोस्टवर असले तर आमच्या घरी पूजा सांगायला कशाला येतील? पुढे बोलण्याला कुठून सुरुवात करावी ते मला सुचत नव्हते. नाना बिवलकरांनीच विचारले, "तुमचं माझ्याकडे काही काम होतं कां?"
"त्याचं असं आहे की आम्हाला एकदा सत्यनारायणाची पूजा करायची आहे." मी चाचपडत म्हंटले
"छान, या रविवारीच करा ना, चांगला दिवस आहे."  नानांना यातले समजत होते आणि इंटरेस्ट होता हे तर समजले.
"पूजा सांगायला येणारे कोणी तुमच्या ओळखीत आहेत का?" मी हळूच विचारणा केली.
"मी ही रविवारी मोकळाच असतो, मीच येऊ शकेन." नानांनी सांगताच माझी काळजी मिटली.
"सत्यनारायणाच्या पूजेला काय काय लागतं ते तुम्हाला माहीत आहे ना?" नानांनी विचारले.
"साधारण कल्पना आहे. तबक, कलश, ताम्हन, विड्याची पानं, सुपा-या, झालंच तर प्रसादासाठी रवा, साजुक तूप, साखर .... "  आवश्यक पदार्थांची मला आठवतील तेवढी नावे मी सांगितली.
"तुमच्याकडे चौरंग असेलच, त्याला बांधायला केळीचे खुंट, आंब्याची पानं ....बुक्का, अष्टगंध ..." नानांनी आणखी काही नावे सांगितली आणि "पूजेचं सगळं सामान चेंबुरच्या पाटलांच्या दुकानात मिळतं." ही माहितीही दिली.
"हो, आम्ही दर वर्षी त्यांच्याकडूनच गणपतीही आणतो आणि त्या उत्सवाला लागणा-या वस्तूही." मी त्यांना दुजोरा दिल्यावर ते बोलले. "जमेल तेवढं सामान तुम्ही आणालच, त्यातून एकादी गोष्ट राहिली तरी देव काही लगेच रागावत नाही."  थोडक्यात सांगायचे तर "या गोष्टींचे टेन्शन घेऊ नका." असे त्यांनी सांगितले.
ते एवढे प्रॅक्टिकल दिसत आहेत हे पाहून मला थोडा धीटपणा आला. मी त्यांना विचारले, "यातलं कोणकोणतं सामान तुम्ही आणता आणि साधारणपणे दक्षिणा वगैरे ....."
"छे छे, अहो भिक्षुकी हा काही माझा व्यवसाय नाहीय्, या निमित्यानं माझ्याकडून पुण्यकार्य घडतं, देवाची नावं जिभेवर येतात आणि आपल्या लोकांचं काम होतं म्हणून मी एकाद दुसरी पूजा घेतो." त्यांनी पहिल्या भेटीतच मला "आपलेसे" केले होते.  "दक्षिणेचं म्हणाल तर तुमची इच्छा असेल तेवढी हवी तर द्या." 
त्यानंतर पुढील वीस पंचवीस वर्षे दर वर्षी नानाच आमच्या घरी येऊन सत्यनारायणाची पूजा सांगत होते. "एवढेच कां?" असे त्यांनी कधीही बोलण्यातून किंवा देहबोलीमधून दाखवले नाही आणि "इतके कशाला?" असेही नाही. वाढती महागाई आणि माझा वाढता पगार यांचा विचार करून मी आपणहून त्यांना जेवढी दक्षिणा देत होतो तिचा ते हंसून स्वीकार करत होते आणि तोंडभर आशीर्वाद देत होते.

आमच्या घरी पुढच्या रविवारी पूजा करायची हे ठरवताच नानांनी लगेच भिंतीवरल्या कॅलेंडरमध्ये त्याची नोंद करून टाकली. त्यांचे काम किती व्यवस्थित असायचे हे त्यातून दिसत होते, पण त्या वेळी ती गोष्ट माझ्या लक्षात आली नाही. सकाळी आठ वाजता पूजा सुरू करायची असे मोघम बोलणे झाले होते. पण तो काही मुहूर्त नव्हता. त्यामुळे आठ म्हणजे साडेआठ नऊ होणार अशी माझी कल्पना होती. पण रविवारी सकाळी आठ वाजायलाही अजून पंधरा वीस मिनिटे शिल्लक असतांनाच नाना आमच्या घरी येऊन हजर झाले.
"पूजेची तयारी कुठपर्यंत आली?" त्यांनी हंसत हंसत विचारले. आमची तयारी सुरूही झालेली नव्हती हे दिसतच होते. पण त्यांनी तसे दाखवून दिले नाही.
"पूजा कुठे मांडायची ठरवली आहे?" नानांनी पुढला प्रश्न केला. आम्ही हॉलमधला एक भाग रिकामा करून ठेवला होता. तो त्यांना दाखवून त्यांनाच विचारले, "इथे केली तर ठीक राहील ना?"
त्यांनी पूर्व पश्चिम दिशा पाहून घेतल्या आणि देवाचे तोंड कोणत्या दिशेला होईल? त्याच्या समोर आम्ही बसणार आणि बाजूला बसतांना त्यांचे तोंड कोणत्या दिशेला होईल? वगैरे विचार करून सगळ्यांच्या जागा ठरवल्या आणि सांगितले, "सगळे सामान इथे आणून ठेवा आणि तुम्ही दोघे तयार होऊन या."

आम्ही बाजारातून आणलेल्या सगळ्या सामानाच्या पिशव्या तिथेच ठेवलेल्या होत्या, घरातली भांडीही आणून त्यांना दिली. त्यांनी चौरंगाला भिंतीशी समांतर ठेवले, त्याच्या चारी खांबांना केळीचे खुंट बांधले, लाल कापडाची व्यवस्थित चौकोनी घडी करून ती चौरंगावर पसरवून चौरंगाला झाकले. त्या कापडावर मूठभर तांदूळ ठेऊन ते वर्तुळाकारात पसरवले. त्याच्या मधोमध कलशाला ठेऊन त्यावर एक ताम्हन ठेवले आणि त्यात तांदूळ भरले. बाळकृष्णाला ठेवण्यासाठी मधोमध थोडी मोकळी जागा सोडून आठ दिशांना अष्टवसू आणि नवग्रह यांच्या नावाने सुपा-या मांडून ठेवल्या. चौरंगावर ओळीने विड्याची पाने मांडून त्यावर नारळ, सुपारी, बदाम, खारीक, गूळखोबरे वगैरे पदार्थ अनुक्रमाने ठेवले. एका बाजूला समई उभी केली.  फुले, दुर्वा, तुळशीची पाने वगैरे एका तबकात आणि गंध, अक्षता, हळद, कुंकू, नाना परिमलद्रव्ये, कापूर, ऊदबत्त्या, निरांजने वगैरे दुस-या तबकात व्यवस्थितपणे मांडून ठेवली. आम्ही तयार होऊन येईपर्यंत नानांनी सगळी जय्यत तयारी करून ठेवली होती.

पूजेची सगळी तयारी करून देऊन ते आतल्या खोलीत गेले आणि शर्ट पँट उतरवून मुकटा नेसून बाहेर आले आणि आम्ही पूजेला बसलो. सुरुवातीपासूनच यातल्या निरनिराल्या विधीमधली एक एक क्रिया करतांना नाना त्या क्रियेचे महत्व आम्हाला थोडक्यात सांगत होते. देवाची पूजा सुरू करायच्या आधी समईची पूजा करून तिच्या वाती पेटवून उजेड करायचा, भूमीला वंदन करायचे, कलशाची पूजा करून त्यात पाणी भरायचे, शंख, घंटा वगैरेंची पूजा करायची वगैरे वगैरे करण्यामागे हा हेतू असतो की या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात आणि त्या सुस्थितीत आहेत हे निश्चित करून घेतले जाते. एकादा प्रयोग सुरू करायच्या आधी त्यासाठी लागणारी सर्व सामुग्री आणि उपकरणे उपलब्ध आहेत हे पाहून ती तपासून घेतली जातात तसेच हे असते हे माझ्या लक्षात आले. पूजेच्या सुरुवातीला एक संकल्प सोडायचा असतो. त्यावेळी या पूजेचे प्रयोजन काय आहे हे सांगायचे असते. प्रयोगासाठीसुद्धा ऑब्जेक्टिव्ह असावे लागतेच. पूजा करणा-या व्यक्तीचे नाव, त्याच्या वडिलांचे आणि कुळाचे नाव आणि गोत्र सांगून हा कार्यक्रम अमूक वारी आणि तिथीला, तमूक नक्षत्रात चंद्र असतांना, अमक्या तमक्या राशींमध्ये सूर्य, मंगळ, गुरू वगैरे इतर ग्रह असतांना आणि भारतातल्या अमक्या स्थळी केला जात आहे याचा उच्चार केला जातो. हे म्हणजे एकादे लीगल अॅग्रीमेंट करतांना सुरुवातीलाच ते करणा-या पार्टींची नावे, हुद्दे, अॅग्रीमेंटची तारीख, ते करण्याचे ठिकाण वगैरे लिहितात तसे असते. यापूर्वी मी कधी याबद्दल विचार केला नव्हता किंवा मला त्यासंबंधीच्या मंत्रांमधले शब्दच समजले नसल्यामुळे गुरूजींनी सांगितले की "मम" म्हणायचे एवढेच माहीत होते. नाना बिवलकर मात्र सर्व मंत्रामधल्या प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार करून ते सावकाशपणे म्हणत असल्यामुळे ऐकू येत होते आणि अधून मधून त्यातला सारांश सांगतही मला असल्यामुळे ते समजत होते आणि त्यात मजा येत होती.

त्यानंतर आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा करायची असली तर नानांना आधी विचारून ती ठरवत होतो आणि पूजा सांगायला नाना नेहमी येतच होते. त्याशिवायही इतर कारणांनीही आमच्या भेटी होत होत्या, माझे एक हरहुन्नरी मित्र आल्हाद आपटे यांच्या पुढाकारातून एक लहानसा संगीतप्रेमी ग्रुप जमला होता. बहुतेक वेळी आपट्यांच्या घरी किंवा काही वेळा आणखी कोणाच्या घरी जमून आम्ही गाण्याचे कार्यक्रम करत होतो. नानांचा मुलगा विवेक सर्वांना तबल्यावर साथ करायचा. बहुतेक वेळा नानाही गाणी ऐकायला येऊन बसत असत. ते आमच्यापेक्षा वयाने बरेच मोठे होते, पण सर्वांमध्ये सहजपणे मिसळत असत. अभंग, भजन वगैरें गाण्यांवर झांजा वाजवून ताल धरत असत. एकदा आम्ही त्यांनाही गायचा आग्रह केला. त्यांनी इतके छान गाणे म्हंटले की मग सगळ्याच बैठकांमध्ये तेही भाग घ्यायला लागले. त्यांनी शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला होता का ते माहीत नाही, पण "घनघनमाला कधी दाटल्या" यासारखे रागदारीवर आधारलेले गाणे ते दणक्यात गायचे, "पाउले चालती पंढरीची वाट" आणि त्याच चालीवरचे "कानाने बहिरा मुका परी नाही" अशी अनेक गाणी त्यांनी व्यवस्थित सादर केली. हळूहळू आमचे आपसातले संबंध वाढत गेले, एकमेकांच्या घरी जाणेयेणे सुरू झाले.

बीएआरसीच्या नोकरीत असतांना ते अॅडमिनमध्ये होते. एलडीसी, यूडीसी, एसजीसी, पीए वगैरे टप्प्यांमधून ते हळूहळू वर सरकत होते. ऑफिसमधला त्यांचा नेमका हुद्दा मी त्यांना कधी विचारलाही नाही आणि त्यांनीहून तो सांगितलाही नाही. माझ्या ऑफीसच्या कामामध्येही मला कधी त्यांना भेटायला जावे लागले नाही किंवा ते माझ्याकडे आले नाहीत. आमचे संबंध पूर्णपणे पर्सनलच राहिले. पण घरी किंवा कॉलनीमध्ये त्यांना भेटणारे सगळे लोक त्यांना चांगला मान देत होते हे मी पहात होतो. तो त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि सर्वांशी करत असलेल्या चांगल्या वागणुकीतून त्यांच्या व्यक्तीमत्वाला मिळत असावा.

नाना रिटायर व्हायच्या आधीच विवेक बीएआरसीत नोकरीला लागला होता. त्यालाही कॉलनीमध्ये जागा मिळाली आणि नानांचे कुटुंब कॉलनीतच राहिले. त्यांनी तळेगावला एक घर घेऊन ठेवले होते, पण ते तिथे जास्त दिवस रहात नसत, अधून मधून तिकडे रहायला गेले तरी काही ना काही कारणाकारणाने ते अणुशक्तीनगरला येत असत आणि बरेच दिवस रहात असत. यामुळे आम्हाला ते भेटतच राहिले आणि पूजेलाही येत राहिले. पुढे माझ्या सेवानिवृत्तीनंतर मीच कॉलनी सोडली. त्यानंतरसुद्धा एक दोन वेळा ते पूजा सांगायला वाशीलासुद्धा आले होते, पण सत्तरी उलटून गेल्यानंतर त्यांना इतक्या दूर यायला सांगणे बरे वाटत नव्हते. वयोमानानुसार अंगातली शक्ती कमी झाल्याने त्यांना ते जमलेही नसते. एक दोन वेळा आम्ही अणुशक्तीनगरला गेलो असतांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटून आलो. पुढे आम्हालाही अधिक फिरणे जमेनासे झाले. त्यामुळे आमच्यातला संपर्क संपुष्टात आला.

दोन महिन्यांपूर्वी माझी पत्नी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झालेली होती. मला तिथे कोचावर बसलेले पाहून विवेक माझ्याजवळ आला. त्याच्याशी बोलतांना कळले की नाना खूप आजारी आहेत आणि त्यांना पुरुषांच्या वॉर्डात ठेवले आहे. व्हिजिटर्सची वेळ पाहून मी त्यांना पहायला त्या वॉर्डमध्ये गेलो. त्या वेळी मात्र नानांकडे पहावले जात नव्हते. त्यांना स्वतःहून उठता बसताही येत नव्हते, दोन माणसे त्यांना धरून त्यांची कुशी वळवत होते. अर्धवट मिटलेल्या त्यांच्या डोळ्यांत कसलीच चमक दिसत नव्हती. मी तिथे आलेलो त्यांना दिसले तरी की नाही, दिसले असले तरी त्यांनी मला ओळखले की नाही हेच समजत नव्हते. ते एक अक्षरही बोलत नव्हते की त्यांच्या चेहे-यावर कोणते भाव उमटत होते. ते कितपत शुद्धीवर होते याबद्दल शंका वाटत होती. माझ्या आठवणीतला त्यांचा ओळखीचा हसरा उत्साही चेहेरा डोळ्यासमोर आला आणि सगळेच अंधुक होत गेले. त्यानंतरही मला दोन तीन दिवस त्या हॉस्पिटलमध्ये जावे लागले होते पण नानांना पहायला पुन्हा त्यांच्या वॉर्डात जायचा मला धीर झाला नाही. काही दिवसांनी कळले की ते आता राहिले नाहीत. मी ज्यांना अनेक वेळा वाकून नमस्कार केला होता आणि ज्यांनी मला आशीर्वाद दिले होते अशा माणसांमध्ये नानांची गणती होत होती. आता राहिल्या आहेत त्या त्यांच्या अनेक स्मृती.

Monday, November 10, 2014

स्व.बाबूजी, स्व.गदिमा आणि संदीप व सलिल

                                         (ही छायाचित्रे आंतर्जालावरून साभार घेतली आहेत.)

मी लहान होतो त्या काळात म्हणजे एकोणीसशे पन्नाशीच्या दशकात टेप रेकॉर्डर, सीडी प्लेयर, इंटरनेट, यू ट्यूब असले काही नव्हते. क्वचित कोणाकडे स्प्रिंगचा फोनोग्रॅम असला तरी त्याचे हँडल फिरवून चावी भरणे, सुई बदलत राहणे, रेकॉर्ड्सचे झिजणे, त्यावर चरे पडून ती बाद होणे वगैरे कटकटींमुळे तो फोनो फक्त खास प्रसंगीच आणि जरा जपून वाजवला जात असे. थोडक्यात सांगायचे झाल्यास आपल्याला हवे ते गाणे ऐकण्याची सोय त्या काळात नव्हती. व्हॉल्ह्व्जवर चालणारा आणि एकाद्या खोक्यासारखा बोजड दिसणारा रेडिओ काही लोकांच्या घरी असायचा, विजेची कृपा असली आणि वातावरण अनुकूल असले तर कधी कधी त्यातून काही गाणी ऐकायला मिळत असत. काही शौकीन लोक त्यांची आवडती चित्रपटगीते ऐकण्यासाठी पुन्हा पुन्हा थेटरात जाऊन ते सिनेमे पहात आणि त्यातली गाणी पाठ करून स्वतःशी गुणगुणत असत. काही उत्साही आणि कलाकार मंडळी स्वतः ती गाणी ऐकून आणि शिकून इतर मुलामुलींना शिकवत असत आणि त्यांच्याक़डून ती घरगुती व शाळेतल्या कार्यक्रमांमध्ये इतर लोकांना ऐकवली जात. त्या टीव्हीपूर्व जमान्यात असे मनोरंजक कार्यक्रम वरचेवर होत असत. अशा काही प्रकारांनी त्या काळातले सुगमसंगीत लोकांपर्यंत पोचत असे. पुढे सेमिकंडक्टर्सवर आधारित ट्रान्जिस्टर रेडिओ आणि कॅसेट टेपरेकॉर्डर आल्यावर घरबसल्या हवी ती गाणी ऐकण्याची सोय झाली आणि हळूहळू हे चित्र बदलत गेले. त्या जुन्या कालखंडात मी पहिल्यांदा ऐकलेली गोड गाणी थोडे प्रयत्न करून ऐकली होती. कदाचित त्यामुळे ती अंतर्मनात जरा जास्तच रुतून बसली होती आणि मला त्या गाण्यांचे गीतकार, संगीतकार व गायक गायिका यांच्याबद्दल वाटणारा आदर ऐकीव गोष्टींमधून किंवा वाचनातून न येता त्या काळात जगतांना आलेल्या प्रत्यक्ष अनुभूतीमधून निर्माण झाला होता.

त्या काळात ओव्या, अभंग, आरत्या, हदग्याची गाणी वगैरे भक्ती किंवा लोकसंगीत आपोआप आमच्या कानावर पडत असे. लहान गावातल्या लोकांना शास्त्रीय संगीत ऐकण्याची संधीच मिळत नसल्यामुळे त्या बाबतीत आम्ही पूर्णपणे अनभिज्ञ होतो. पुणे, मुंबई किंवा मिरज, धारवाड यासारख्या शहरांमध्ये काही दिवस राहून आलेले काही लोक थोडे फार शास्त्रीय संगीत ऐकून आलेले असत. "केवळ रागदारीतले आ..ऊ... म्हणजेच खरे संगीत, इतर सगळे टाकाऊ" असले काही तरी ठामपणे सांगून लतादीदी आशाताई यासारख्या आमच्या आवडत्या गायिकांबद्दल अनुदार उद्गार काढणारे हे लोकच आम्हाला शिष्ट किंवा चक्रम वाटायचे. यामुळे त्यांच्यापासून आणि शास्त्रीय संगीतापासून मी बरीच वर्षे चार हात दूर राहिलो होतो. मराठी भावगीते, चित्रपटगीते आणि हिंदी सिनेमांमधली गाणीच मी आवडीने ऐकत होतो. त्यासाठी थोडी हालचाल करावी लागली तर ती करत होतो.

एकोणीसशे पन्नाशी, साठीच्या काळात मराठी सुगम संगीताला चांगले दिवस आले होते. त्या काळातले अनेक गुणी आणि प्रतिभासंपन्न गीतकार, संगीतकार आणि गायक गायिका ही मंडळी त्यांच्या नवनव्या रचना रसिकांपुढे आणत होती. रेडिओवर लागलेल्या प्रत्येक गाण्याचे गीतकार, संगीतकार आणि गायक वा गायिका यांची नावे दर वेळी स्पष्टपणे सांगितली जात असत. संगीतकार किंवा गायक म्हणून स्व. सुधीर फडके म्हणजे बाबूजी आणि गीतकार म्हणून स्व.ग.दि.माडगूळकर (गदिमा) यांची नावे त्यातून नेहमी कानावर पडत असत. या दोघांनी एकत्र येऊन तयार केलेली चित्रपटगीते तेंव्हा खूप लोकप्रिय झाली होती, स्व.राजा परांजपे यांच्या चित्रपटांमधली गाणी तर विशेष गाजली होती. बहुधा या त्रयींचे काही अजब रसायन त्या कालात जमले होते. स्व.बाबूजी आणि स्व.गदिमा यांनी आकाशवाणीसाठी तयार केलेले गीतरामायण हा तर संगीताच्या क्षेत्रातला एक चमत्कार म्हणता येईल. त्या काळातल्या लोकप्रिय गीतकारांमध्ये पी.सावळाराम, राजा बढे, शांताबाई शेळके, वंदना विटणकर, जगदीश खेबुडकर आदि अनेक आदरणीय नावे होती. कवीवर्य कुसुमाग्रज, वसंत बापट, इंदिरा संत आदीं प्रसिद्ध कवींच्या काही निवडक काव्यांना संगीतबद्ध करून त्यांचे प्रसारण केले गेले होते, या बाबतीत मंगेश पाडगावकरांचे नाव सर्वात पुढे होते. संतवाङ्मयातले अभंग आणि बहिणाबाई चौधरी, स्वातंत्र्यवीर सावरकर, भा.रा.तांबे यांच्यासारख्या श्रेष्ठ कवींच्या काही उत्कृष्ट कविता नव्या आकर्षक चालींमधून सादर केल्या गेल्या होत्या. बाबूजींच्या काळातच वसंत प्रभू, दत्ता डावजेकर, पु.ल.देशपांडे, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर इत्यादि संगीतकारांनीसुद्धा एकाहून एक सरस गाणी दिली होती. अशा प्रकारे मराठी सुगमसंगीताचे विश्व समृद्ध होत असले तरी त्याच काळातल्या हिंदी सिनेमांमधल्या गाण्यांची मनाला जास्त भुरळ पडत होती. नौशाद, शंकर जयकिशन, सचिनदेव बर्मन, सलिल चौधरी, कल्याणजी आनंदजी, मदनमोहन, ओ पी. नय्यर वगैरे संगीत दिग्दर्शकांनी मराठी भाषिक लोकांच्या मनाचासुद्धा जास्तच ताबा घेतला होता.

ज्याप्रमाणे वस्तूंची लांबी, रुंदी, उंची, खोली, वजन यासारख्या रुक्ष आकडेवारीने मोजमापे काढून त्यांची तुलना करता येते, तसे कलेच्या क्षेत्रात करता येत नाही. ऐकलेले कोणते गाणे कानाला जास्त गोड वाटेल, मनाला अधिक स्पर्श करेल, दीर्घ काळ आठवणीत राहील या गोष्टी व्यक्तीसापेक्ष असतात. ज्या ज्या गीतकारांची आणि संगीतकारांची गाणी लोकांना खूप आवडली आणि दीर्घकाळ लक्षात राहिली, ज्यांना सर्वांनी मनापासून दाद दिली गेली, ती सगळीच मंडळी माझ्या दृष्टीने महान आणि आदरणीय राहिली. त्यात स्व.बाबूजी आणि स्व.गदिमा यांची नावे ठळकपणे येतात. या लेखाच्या शीर्षकात फक्त तीच घेतली आहेत याला एक तात्कालिक कारण झाले. ते म्हणजे "संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी यांची सध्याची लोकप्रिय जोडी ही स्व.बाबूजी आणि स्व.गदिमा यांच्या जोडीसारखी आहे." असे विधान अलीकडे कुणीतरी कुठे तरी केले आणि त्यावर एक लहानसे वादळ उठले. आजकाल दोन सख्ख्या भावांना कुणी "रामलक्ष्मणाची जोडी" म्हंटले, किंवा अनुरूप पतीपत्नींना "लक्ष्मीनारायणाचा जोडा" म्हंटले तरीसुद्धा काही लोकांच्या नाजुक भावना दुखवल्या जाण्याची शक्यता आहे.

समकालीन कलाकारांचीसुद्धा तुलना करता येत नाही हे मी वर लिहिले आहेच. निरनिराळ्या कालखंडातल्या लोकांची तुलना करणे तर माझ्या मते अप्रस्तुत आहे. गेल्या चार पाच दशकांहून जास्त काळात सर्वच क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. सामाजिक परिस्थिती, कुटुंब व्यवस्था, राहणीमान यामधील बदलांचे परिणाम माणसामाणसांमधल्या नात्यांवर झाले आहेत. इतर भाषांमधले साहित्यप्रवाह आता अधिक ओळखीचे झाले आहेत. यामुळे पूर्वीचे ज्वलंत विषय मागे पडले आहेत, नव्या समस्यांमधून नवे विषय समोर उभे ठाकले आहेत. या सर्वांचा प्रभाव साहित्यावर आणि काव्यरचनांवर होणारच. या दरम्यानच्या काळात संगीताच्या क्षेत्रामध्येसुद्धा नवनवे प्रयोग केले गेले, अनेक प्रकारचे नवे वारे इतर भाषांमधल्या किंवा परदेशातल्या संगीतातून इकडे आले. पूर्वीची वाद्ये मागे पडून नवी वाद्ये आली, आधुनिक तंत्रज्ञानातून कृत्रिम ध्वनि निर्माण करणे शक्य झाले. ध्वनिमुद्रणाच्या तंत्रात अचाट प्रगती झाली. नव्या संगीतकारांनी यांचा उपयोग करून घेतला पाहिजेच. ते लोक तसा घेतही आहेत. माझ्या लहानपणी सर्वसामान्य लोकांना गाणे ऐकण्याच्या संधी किती कमी होत्या हे मी सुरुवातीलाच लिहिले आहे. त्यामुळे त्या काळातल्या श्रोत्यांनी सुद्धा फक्त तेंव्हा प्रचलित असलेली गाणीच ऐकलेली असायची. आजकाल आपण सव्वाशे वर्षांपूर्वीच्या "पंचतुंड नररुंडमाळधर" पासून ते अलीकडच्या "टिकटिक वाजते डोक्यात" पर्यंत सगळ्या प्रकारची गाणी सहजपणे ऐकू शकतो. यामुळे श्रोत्यांची बहुश्रुतता वाढली आहे. त्यांच्या अपेक्षाही त्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यांच्या आवडी बदलल्या आहेत.

याचा विचार केला तर संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी यांच्या आजकालच्या गाण्यांची तुलना जुन्या काळातल्या प्रसिद्ध गाण्यांशी करण्यात काही अर्थ नाही हे लक्षात येईल. शिवाय आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. स्व.गदिमा आणि स्व.बाबूजींनी प्रत्येकी हजारावर गाणी रचली असतील, दोघांनी मिळूनही शेकड्यांमध्ये गाणी केली असतील. त्यातली सर्वोत्तम अशी काही मोजकी गाणीच आपल्याला आज ऐकायला मिळतात, पूर्वीच्या काळात सुद्धा फारशी न चाललेली त्यांची बाकीची सगळी गाणी काळाच्या उदरात लुप्त झाली आहेत. याच्या उलट नव्या गीत आणि संगीतकारांची सरसकट सगळी गाणी आपल्यासमोर येत असतात, त्यात बरी वाईट, उत्तम, मध्यम, सुमार वगैरे सगळी असतात. यातली किती गाणी पुढच्या पिढीपर्यंत म्हणजे निदान वीस पंचवीस वर्षांनंतर शिल्लक राहतील हे काळच ठरवेल.

जुन्या आणि नव्या गीतसंगीतकारांच्या रचनांची तुलना करता येणार नाही, पण त्या रचना लोकांपर्यंत पोचवण्यात त्यांना किती यश आले आणि त्यांना श्रोत्यांचा किती प्रतिसाद मिळाला किंवा मिळत आहे हे कदाचित पाहता येईल. यातसुद्धा काळानुसार फरक पडला आहेच. आज प्रचार आणि प्रसाराची साधने वाढली आहेत, दळणवळण सोपे झाले आहे, लोकांची आर्थिक स्थिती सुधारली आहे, या सगळ्यामुळे जास्त लोकांना संगीताचे कार्यक्रम पाहणे शक्य झाले आहे. याच्या उलट टेलिव्हिजन आणि इंटरनेटसारखी घरबसल्या मनोरंजन करून घेण्याची सुलभ साधने उपलब्ध झाल्यामुळे मुद्दाम उठून कार्यक्रमासाठी बाहेर जाण्याची गरजही आता वाटेनाशी झाली आहे. तसेच रोजचे जीवन जास्तच धकाधकीचे झाल्यामुळे कार्यक्रम पहायला वेळ मिळणे कठीण झाले आहे. यामुळे थेटरे रिकामी पडायला लागली आहेत. तरीसुद्धा संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी ही माझ्या माहितीतली तरी सध्याची एकमेव जोडी आपले कविता वाचन आणि गायनाचे कार्यक्रम मोठ्या सभागृहांमध्ये करण्यात यशस्वी होत आहे.

स्व.ग.दि.माडगूळकर गीतरचनांबरोबर कथा, पटकथा, संवादही लिहीत होते आणि चित्रपटांमध्ये भूमिकाही करत असत आणि स्व.सुधीर फडकेही त्यांच्या कामामध्ये खूप गढलेले असायचे. त्या दोघांनी जोडीने गावोगावच्या सभागृहांमध्ये जाऊन कविता वाचन आणि गायनाचे कार्यक्रम सादर केल्याचे कधी माझ्या ऐकण्यात आलेले मला तरी आठवत नाही. अशा प्रकारचा कार्यक्रम मी कधीही पाहिला नव्हता. या दोघा दिगिगजांनी एकत्र येऊन जितकी गाणी दिली असतील त्याहून किती तरी जास्त गाणी निरनिराळ्या गीतकारांबरोबर किंवा संगीतकारांबरोबर दिली असतील. त्यांना मुख्यतः प्रसारमाध्यमांमधून लोकप्रियता मिळाली होती. आजच्या टेलिव्हिजन या मुख्य प्रसारमाध्यमामध्ये संगीतालाच गौण स्थान दिले जाते. यामुळे निरनिराळ्या काळातल्या या दोन जोड्यांची कसलीच तुलना करता येणार नाही. शिवाय स्व.बाबूजी आणि स्व.गदिमा यांची जोडी कालांतराने फुटली, संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी अजून एकत्र आहेत हे ही महत्वाचे आहे.

संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी ही जोडी जे कार्यक्रम सादर करते त्यातली "दूरदेशी गेला बाबा" यासारखी गाणी ऐकतांना बहुसंख्य श्रोत्यांच्या पापण्या पाणावतात आणि "अग्गोबाई ढग्गोबाई" यासारख्या गाण्यांच्या तालावर सगळी बच्चे कंपनी उत्स्फूर्तपणे नाचू लागतात. श्रोत्यांच्या मनाला स्पर्श करणे, त्यांच्या डोळ्यात पाणी किंवा ओठावर एकादी तरी स्मितरेषा आणणे हे सोपे नसते. पण या नव्या गीतकार आणि संगीतकारांना ते जमले आहे. त्यांच्याबद्दल काही तज्ज्ञ लोकांनी तुच्छ मते व्यक्त केली आहेत. पण सभागृहांमध्ये जाऊन त्यांचे कार्यक्रम पाहणारे (आणि ऐकणारे), त्यांच्या ध्वनिमुद्रित सीडी, डीव्हीडी वगैरे विकत घेऊन ऐकणारे किंवा यू ट्यूबवर पाहणारे सर्वसामान्य लोक वेगळा विचार करतात आणि त्यांची संख्या मोठी आहे. ही जोडी आणखी प्रगती करू दे, उत्तमोत्तम गाणी रचून रसिकांना ऐकवू दे अशी आशा बाळगायला काय हरकत आहे?
    

Saturday, October 18, 2014

निवडणुका - भाग १ ते ६

निवडणुका भाग १ 

स्वतंत्र भारतातली पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५१-५२ साली झाली तेंव्हा मी फारच लहान होतो, मला त्याबद्दल काहीच आठवत नाही. त्यानंतर १९५७ साली झालेली दुसरी निवडणूक मला अंधुकशी आठवते. त्या काळात फ्लेक्सचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे गावात जागोजागी आतासारखी मोठमोठी रंगीबेरंगी पोस्टर्स लावली जात नव्हती. स्थानिक पेंटरने रंगवलेले लहान लहान फलक गावातल्या काही मोक्याच्या जागी लावले होते. बैलजोडीचे चित्र काढलेले पोस्टर एका त्रिकोणी ए फ्रेम्सच्या दोन्ही बाजूंना लावून त्यांना खाली एका लहानशा हातगाडीसारखी दोन चाके बसवली होती. अशा काही गाड्या वाजतगाजत गावामध्ये फिरवल्या जात होत्या. त्या काळात सिनेमाच्या जाहिरातीही अशाच गाड्यांवरून केल्या जात असत. दहा बारा बैलजोड्यांना सजवून एका रांगेत चालवत त्यांची एक मोठी मिरवणूक रस्त्यावरून जात असतांना मी एकदा पाहिली होती. त्यांच्यासोबत अनेक खादीधारी कार्यकर्ते बेंबीच्या देठापासून जोर लावून घोषणा देत चालत होते. त्यांच्या मागे एका सजवलेल्या बैलगाडीत उभे राहिलेले स्व.बसप्पा दानप्पा जत्ती म्हणजे आमचे जत्तीमंत्री रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या सर्व लोकांना विनम्र अभिवादन करत होते.

या सद्गृहस्थाला लहानपणी जवळून पाहतांना मला ते जसे दिसले होते, त्यांचे जे इम्प्रेशन माझ्या बालमनावर उमटलेले होते ते अखेरपर्यंत जवळजवळ तसेच राहिले. त्या काळात ते तेंव्हाच्या मुंबई राज्यात स्व.मोरारजी देसाई यांच्या हाताखाली कसलेसे उपमंत्री होते. यामुळे गावातले लोक त्यांना जत्तीमंत्री याच नावाने ओळखत असत. पुढे राज्यपुनर्रचना झाली आणि आमचा भाग मैसूर राज्यात (आजच्या कर्नाटकात) गेला. तिथे निजलिंगप्पा आणि हनुमंतय्या नावाचे दोन हुम्म गडी सुंदउपसुंदांसारखे एकमेकांशी झुंजत होते. त्यावर तोडगा म्हणून आमच्या अजातशत्रू, मृदूभाषी आणि सौम्य सोज्ज्वळ वृत्तीच्या जत्तींच्या गळ्यात एकदम मुख्यमंत्रीपदाची माळ घालण्यात आली. पुढे निजलिंगप्पांची सरशी झाल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले आणि जत्तींनी त्यांच्या मंत्रीमंडळात वेगवेगळी खाती सांभाळली. तिथून उचलून त्यांना एकदम भारताचे उपराष्ट्रपती बनवले गेले आणि राष्ट्रपतींचे अचानक निधन झाल्यानंतर काही काळ ते हंगामी राष्ट्रपतीही झाले. या काळात मी त्यांना अनेक वेळा दूरदर्शनवर पाहिले. त्यात दर वेळी मला त्यांच्या चेहे-यावर तसेच भाव दिसले आणि बोलण्याचालण्यातून तसेच देहबोलीमधून माझ्या ओळखीचे तेच व्यक्तीमत्व प्रगट झाले.

पंडित नेहरूजींच्या काळात काँग्रेस हाच एकमेव राष्ट्रीय पक्ष होता. आपल्या देशात समाजवादी, प्रजासमाजवादी, साम्यवादी, जनसंघ, स्वतंत्र वगैरे आणखीही काही पक्ष आहेत आणि मुंबई, पुणे, दिल्ली, कलकत्ता यासारख्या शहरांमध्ये त्यांचा थोडाफार जोर आहे असे मोठ्या लोकांच्या बोलण्यामधून कानावर पडत होते. त्या काळात घरोघरी वर्तमानपत्रे घेतली जात नसत. गावातल्या सार्वजनिक वाचनालयातल्या मोठमोठ्या लाकडी स्टँड्सवर निरनिराळी वर्तमानपत्रे स्क्रूने अडकवून ठेवलेली असायची. माझी उंची तिथपर्यंत वाढल्यानंतर निव्ळ कुतूहल म्हणून मीही अधून मधून त्यात डोके खुपसून पाहून येत असे. त्यामुळे कॉ.डांगे, काँ.गणदिवे, ना.ग.गोरे, मधू लिमये, राजगोपालाचारी, अटलबिहारी वाजपेयी अशी काही नावे अधून मधून नजरेखालून जात होती. पण आमच्या गावात मात्र दुस-या कोणत्याही पक्षाचे अगदी नाममात्र अस्तित्वही नव्हते. निवडणुकीतल्या उमेदवाराचे नाव किंवा चेहरासुद्धा ओळखीचा नसला तरी सगळ्यांचे शिक्के बैलजोडीच्या चिन्हावर मारले जात असत. त्या काळात एकाद्या बुजगावण्याला गांधी टोपी घालून उभे केले असते तरी तोसुद्धा सहज निवडून आला असता अशीच परिस्थिती होती. आमचे जत्तीमंत्री तर चांगले सुशिक्षित, सुसंस्कृत आणि हुषार दिसायचे, ते निवडून न येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांच्या विरोधात कुठला कोण माणूस उभा होता त्याच्याबद्दल एक अक्षरसुद्धा कधी माझ्या कानावर पडलेले आठवत नाही. त्या काळात लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जायच्या. आमचा भाग लोकसभेच्या कोणत्या मतदारसंघात येतो आणि तिथे बैलजोडीच्या चिन्हावर कोणता पाटील की गौडा उभा होता हे ही आता आठवत नाही. तो गृहस्थ आमच्या गावातला नक्कीच नव्हता आणि त्याच्याबद्दल माहिती समजून घेण्यात कोणालाही मुळीसुद्धा रसही नव्हता. यामुळे त्या निवडणुकीच्या निकालाबद्दल गावातल्या कोणालाही कसलीच उत्सुकता नव्हती. आमचे जत्तीमंत्री ठरल्याप्रमाणे निवडून आले आणि मुंबईला जाऊन पुन्हा मंत्रीपदावर विराजमान झाले. खरे सांगायचे तर त्या काळात ते मुंबईमध्येच वास्तव्याला होते, प्रचाराच्या निमित्याने एक दोनदा गावाकडे येऊन गेले असतील. 

........... (क्रमशः)

--------------------------------------------------------


निवडणुका - भाग २


मी कॉलेजच्या हॉस्टेलवर रहायला गेल्यानंतर रोज तिथल्या मेसमध्ये सगळी वर्तमानपत्रे वाचायला मिळायची. ठळक मथळे, बातम्या, लेख, अग्रलेख वगैरे वाचता वाचता माझा देशाच्या राजकारणातला इंटरेस्ट वाढत गेला. त्या काळात अनेक घटनाही घडून आल्या. १९६२ सालच्या निवडणुका झाल्या त्या काळात मी मुंबईत होतो. त्यामुळे सगळ्या पक्षांमधल्या मोठ्या पुढा-यांची भाषणे वाचायला आणि काहीजणांची भाषणे ऐकायला मिळाली. त्या निवडणुकीतली ईशान्य मुंबईमधली लढत खूप गाजली होती. काँग्रेसचे उमेदवार तत्कालीन संरक्षणमंत्री व्ही.के.कृष्णमेनन आणि विरोधी पक्षांनी एकजूट करून प्रजासमाजवादी पक्षातर्फे रणांगणात उतरवलेले वयोवृद्ध ज्येष्ठ नेते आचार्य जे.बी.कृपलानी यांच्यात अटीतटीचा सामना झाला. तसे पाहता हे दोघेही बाहेरून आलेले उमेदवार होते, यातला कोणीच स्थानिक नव्हता. पण इथले सर्वसामान्य लोकसुद्धा या किंवा त्या उमेदवाराची बाजू घेऊन एकमेकांशी वादविवाद करतांना दिसत होते. प्रत्यक्ष मतदानात मात्र मेनन यांना घवघवीत यश मिळाले. आधी होऊन गेलेल्या तीन निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीतही पं.नेहरूंच्या अधिपत्याखाली काँग्रेसने चांगला दणदणित विजय मिळवला आणि ते पंतप्रधानपदी विराजमान झाले.

पण त्या वर्षाअखेरीला चीनने केलेल्या आक्रमणाने पं.नेहरूंना तोंडघशी पाडले. त्यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. काँग्रेसची प्रतिमा सुधारण्याच्या उद्देशाने पंडितजींनी कामराज योजनेच्या नावाने अनेक वयोवृद्ध नेत्यांना मंत्रीपदावरून हटवले. पण ते स्वतःच पुढे जास्त काळ राहिले नाहीत. त्यांच्या निधनानंतर लालबहादुर शास्त्री पंतप्रधान झाले. त्यांनी अल्पावधीतच आपली चांगली छाप पाडली, पण दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर त्या काळच्या सर्व ज्येष्ठ पुढा-यांना वगळून श्रीमती इंदिरा गांधींना पंतप्रधान करण्यात आले. या दोन्ही घटनांमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कामराज यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. इंदिरा गांधींनी नव्या दमाचा आपला खास गट स्थापन केला आणि जुन्या नेत्यांना न जुमानता सत्तेची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली. त्यांना गूँगी गुडिया समजणारे जुने पुढारी यामुळे नाराज झाले. या पार्श्वभूमीवर झालेली १९६७ ची निवडणूक थोडी चुरशीची झाली आणि इंदिराजींनी ती जेमतेम जिंकली. त्यानंतर त्यांनी जी अनेक पावले उचलली त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत गेली आणि पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धानंतर ती शिगेला पोचली. त्यानंतर १९७२ मध्ये झालेल्या निवडणुका त्यांनी सहजपणे जिंकल्या. माझ्यासकट सगळ्या तरुण वर्गाला या कालावधीत इंदिराजींबद्दल खूप आदर वाटत होता.

पण विरोधी पक्षांची ताकतही वाढली होती. भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी एक आंदोलन सुरू केले गेले. निर्विवाद निष्कलंक चारित्र्य असलेले ज्येष्ठ समाजवादी नेते बाबू जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली चाललेले हे जन आंदोलन हाताबाहेर जात आहे असे दिसताच पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी पुकारली आणि एक दमनयंत्र सुरू झाले. सर्व प्रमुख विरोधी नेत्यांची धरपकड झालीच, लहानसहान कार्यकर्त्यांनाही तुरुंगांमध्ये डांबून ठेवण्यात आले. काँग्रेसअंतर्गत विरोधी सूरसुद्धा दाबून टाकले गेले. काही लोकांचा तर त्यांचा राजकारणाशी कसलाच संबंध नसतांना निव्वळ संशय, व्यक्तीगत आकस किंवा गैरसमजुतीमुळे पकडले गेले असे म्हणतात. नातेवाईक, शेजारी, मित्रमंडळी आणि त्यांचे शेजारी, मित्र किंवा नातेवाईक वगैरे वाढत जाणा-या वर्तुळांमधल्या कुणाला तरी पकडून नेल्याची बातमी अधून मधून कानावर यायची. त्या व्यक्तीशी आपला काही संबंध आहे हे कुणाला कळू नये म्हणून ती बातमी दबक्या आवाजात पण तिखटमीठ लावून सांगितली जायची. सगळी प्रसारमाध्यमे दहशतीखाली असल्यामुळे खरे खोटे समजायला कोणताच मार्ग नव्हता. आपल्या आसपास वावरणारे कोण लोक गुप्तहेरगिरी करत असतील हे सांगता येत नसल्यामुळे मनावर सतत एक दडपण असायचे. यामुळे वरून शांत दिसली तरी बहुतेक जनता मनातून खदखदत होती.

१९७७ साली घेतलेल्या लिवडणुका अशा वातावरणात झाल्या. आणीबाणीच्या काळात सरसकट सगळ्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांना अटकेत डांबून ठेवले गेले असल्यामुळे तुरुंगांमध्येच त्यांचे थोडेफार सख्य जमले होते. सुटून बाहेर आल्यानंतर काँग्रेस पक्षाविरुद्ध लढा देण्यासाठी आपापसातले तात्विक मतभेद बाजूला ठेऊन ते सगळे एकत्र आले. काँग्रेस पक्षाला सत्तेवरून खाली खेचणे एवढा एकच कार्यक्रम घेऊन जनता पक्ष नावाचा एक नवा पक्ष घाईघाईत तयार केला गेला. आणीबाणी उठवली गेली असली तरी लोकांच्या मनात भीती होतीच. निदान संशय तरी होता. त्यामुळे उघडपणे बोलायला ते अजूनही बिचकत होते, पण ज्या लोकांना आणीबाणीची प्रत्यक्ष झळ आधीच लागून गेली होती ते मात्र करो या मरो या भावनेने कामाला लागले. त्या काळात दूरदर्शनवरले प्रसारण सुरू झालेले असले तरी ते मुख्यतः सरकारीच असायचे. त्यावर जाहिराती दिल्या जात नव्हत्या. कुठल्याही कार्यक्रमात एकाद्या पक्षाचा प्रचार नाहीच, साधा उल्लेखसुद्धा येऊ दिला जात नव्हता. खाजगी वाहिन्या तर नव्हत्याच. त्या निवडणुकीतला प्रचार मुख्यतः दारोदारी फिरून मतदारांना भेटून केला गेला. आणीबाणीच्या काळात केल्या गेलेल्या दडपशाहीचा लोकांनाच इतका तिटकारा आला होता की तेही जनता पक्षाच्या प्रचाराला उत्स्फूर्त दाद देत होते.

त्या काळात एकदा आमच्या कॉलनीतल्या कोप-या कोप-यावर जाऊन, तिथे एका जीपच्या टपावर उभे राहून तिथे रस्त्यात जमलेल्या लोकांसमोर पोटतिडिकीने भाषण करतांना मी प्रमोद महाजनांना पाहिले होते. हा चळवळ्या तरुण पुढे जाऊन मोठा नेता होणार आहे असे तेंव्हा मला माहीत नव्हते. पु.ल.देशपांडे, दुर्गाबाई भागवत यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि लोकांच्या मनात आदरभाव असलेल्या साहित्यिकांनीसुद्धा लेख लिहून आणि भाषणे करून जनजागृती करण्याची मोहीम हातात घेतली. ती निवडणूक त्यापूर्वी झालेल्या कुठल्याही निवडणुकीपेक्षा खूप वेगळी होती. इतके चैतन्य मी यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. अर्थातच मतमोजणी सुरू झाली तेंव्हा काय निकाल लागेल याबद्दल प्रत्येकाच्या मनात प्रचंड उत्कंठा होती. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी दिवसभर रेडिओसमोर बसून निकालाच्या बातम्या एकत आणि टाळ्या वाजवून दाद देत राहिलो. आम्ही रहात असलेल्या भागातून जयवंतीबेन मेहता निवडून आल्याचे कळताच झालेला जल्लोष अपूर्व होता. देशभरात, मुख्यतः उत्तर भारतात काँग्रेसचा साफ धुव्वा उडाला होता आणि खरोखरीच लोकशाहीचा विजय झाला होता.
.  . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः) 
--------------------------------------------------

निवडणुका भाग ३


मृगाः मृगैः संगमनुव्रजन्ति गोभिश्च गावः तुरगास्तुरंगैः ।

मूर्खाश्च मूर्खैः सुधियः सुधीभिः समानशीलव्यसनेषु सख्यम् ।।

असे एक संस्कृत सुभाषित आहे. यात सांगितल्याप्रमाणे हरिणांचे हरिणांबरोबर किंवा गायींचे गायींसोबत सख्य होते त्याचप्रमाणे मूर्खांचे मूर्खांशी आणि सज्जनांचे सज्जनांशी चांगले जुळते. अर्थातच परस्परविरोधी स्वभावाच्या प्राण्यांचे किंवा माणसांचे सख्य होत नाही, झाले तरी ते फार काळ टिकत नाही. १९७७ साली झालेल्या निवडणुकांमध्ये ज्या महाभागांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली होती ते असेच एकमेकांहून फारच भिन्न प्रकृतीचे होते. मोरारजीभाई देसाई आणि जॉर्ज फर्नांडिस, लालकृष्ण अडवानी आणि राजनारायण अशासारख्या नेत्यांमधून पूर्वी कधी विस्तव जात नव्हता. काहीही करून काँग्रेस पक्षाला सत्तेवरून खाली खेचायचेच अशा सिंगल पॉइंट प्रोग्रॅमसाठी ते एकत्र आले होते. ते उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर त्यांच्या आपापसातल्या कुरबुरी सुरू झाल्याच, मोरारजीभाईंना दिलेली पंतप्रधानपदाची खुर्ची आपल्यालाच मिळावी यासाठी इतर वयोवृद्ध नेते आसुसलेले होते. त्यातल्या संधीसाधू चरणसिंग यांनी इतर काही खासदारांना आपल्या बाजूला करून घेतले आणि इंदिरा गांधींचा छुपा पाठिंबा घेऊन जनता पक्षातून बंडखोरी केली, सरकारला अल्पमतात आणले, मोरारजीभाईंना राजीनामा द्यावा लागला आणि चरणसिंग.पंतप्रधानपदी विराजमान झाले. जेमतेम सहा महिने गेल्यानंतर इंदिरा गांधींनी त्यांना दिलेला पाठिंबा काढून घेतला आणि सरकारला मध्यावधी निवडणुका करायला भाग पाडले.

१९८० साली झालेली सहाव्या लोकसभेची निवडणूक या पार्श्वभूमीवर झाली. तोपर्यंतच्या काळात जनता पार्टीचा प्रयोग सपशेल अयशस्वी झाला होता. पूर्वाश्रमीच्या जनसंघीयांनी भारतीय जनता पार्टी या नावाचा नवा पक्ष स्थापन केला होता. समाजवादी, साम्यवादी वगैरें डाव्या विचातसरणीच्या लोकानी पुन्हा त्याला जोरदार विरोध सुरू केला होता. विरोधी पक्षांचे नेते पुन्हा पूर्वीसारखेच आपापसात हाणामारी करत असल्यामुळे त्यांचा प्रभाव त्यांच्या काही बालेकिल्ल्यांमध्येच शिल्लक राहिला होता. सामान्य जनतेला त्यांचा विश्वास वाटत नव्हता. आणीबाणीच्या काळातल्या घटनांबद्दल लोकांचा दृष्टीकोणही थोडा बदलला होता. त्यापूर्वीच्या काळातल्या १९७७ च्या निवडणुकांमध्येही महाराष्ट्र आणि दक्षिण भारताने काँग्रेसला साथ दिलेली होतीच. १९८० च्या निवडणुकीत त्यात वाढ झाली आणि उत्तर भारतात काही ठिकाणी कांग्रेस पक्षाने पुन्हा आपले बस्तान बसवले. तीनच वर्षांपूर्वी पराभूत होऊन पायउतार झालेल्या इंदिरा गांधी १९८० च्या निवडणुकींमध्ये पुन्हा बहुमताने विजयी झाल्या आणि सत्तेवर आल्या. या काळात त्यांनी आपला चांगला जम बसवला आहे असे वाटत असतांनाच त्यांचा खून करण्यात आला. देशाच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी जी पावले उचलली होती त्यामुळे नाराज झालेल्या लोकांनी हे कृत्य केले असल्यामुळे इंदिराजींना एक प्रकारचे हौतात्म्य प्राप्त झाले. त्याच्या निधनानंतर पंतप्रधानपदावर आलेले  त्यांचे सुपुत्र राजीव गांधी यांना याचा फायदा झाला.

इंदिरा गांधी पंतप्रधानपदी असतांनासुद्धा राजीव गांधी राजकारणात न येता वैमानिकाची नोकरी करत होते, प्रसिद्धीच्या झगमगाटापासून सतत दूर राहिले होते. त्यांच्या वर्तनामधून त्यांची एक वेगळी प्रतिमा तयार झाली होती. आणीबाणीच्या काळातल्या हडेलहप्पी घटनांचे खापर संजय गांधींवर फोडून झाले होते, जनतेकडून त्यावर झालेल्या संतप्त प्रतिक्रियांचा फटका राजीव यांना बसला नव्हता. ते या देशाचे सर्वात तरुण आणि उमदे पंतप्रधान होते आणि प्रगतीची भाषा बोलत होते, शिवाय इंदिरा गांधींच्या हौतात्म्यामुळे मिळालेली सहानुभूती होतीच. त्यां घटनेनंतर लगेचच झालेल्या १९८४च्या निवडणुकीवर या सर्वांचा मोठा परिणाम झाल्याने राजीव गांधींच्या काँग्रेस पक्षाला ४०० च्यावर जागा मिळून अभूतपूर्व असा विजय मिळाला. या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातसुद्धा सर्वांना याचा अंदाज आला होता त्यामुळे ती चुरशीची झालीच नाही.

राजीव गांधी यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ तसा सुस्थितीत गेला. पण विरोधी पक्षांनीही आपापली मोर्चाबंदी वाढवली होती. त्यानंतर १९८९ साली झालेल्या निवडणुकीच्या आधी काँग्रेसमधले विश्वनाथ प्रतापसिंह यांनी बंडाचा झेंडा उभारला आणि ते काँग्रेसमधून बाहेर पडले. संरक्षणखात्यासाठी परदेशातून केल्या गेलेल्या मोठ्या किंमतीच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार केला गेला असल्याचा खूप बोभाटा झाला. त्या काळात गाजलेल्या एका व्यंगचित्रात असे दाखवले होते की विश्वनाथ प्रतापसिंह यांच्याकडे पाहून राजीव गांधी म्हणत आहेत, "इसकी कमीज मेरे कमीजसे ज्यादा सफेद क्यूँ?"  या निवडणुकीत पुन्हा अटीतटीच्या लढती झाल्या आणि पहिल्यांदाच काँग्रेस पक्ष अल्पमतात आला. विश्वनाथ प्रतापसिंह यांच्या नेतृत्वाखाली एक लोकशाही आघाडी स्थापन करण्यात आली आणि त्या मोर्च्याने सत्ता काबीज केली. पण १९७७ साली जशी जनतापक्षाची खिचडी तयार केली गेली होती, तसेच या आघाडीच्या बाबतीत झाले. यातले पक्ष तर स्वतंत्रच राहून निरनिराळ्या सुरांमध्ये बोलत राहिले होते. यामुळे पूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. जेमतेम वर्षभरामध्ये त्यात बंडाळी झाली आणि या वेळी चंद्रशेखर यांनी फुटून बाहेर पडून काँग्रेसच्या मदतीने पंतप्रधानपद मिळवले. पण तेही काही महिनेच टिकले आणि १९९१मध्ये पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुका करणे प्राप्त झाले.

१९९१च्या निवडणुकी वेगळ्याच कारणाने ऐतिहासिक ठरल्या, त्या वेळी अत्यंत प्रबळ असा कोणताच राष्ट्रीय पक्ष भारतात शिल्लक राहिला नव्हता. निरनिराळ्या राज्यांमध्ये अनेक स्थानिक पक्ष प्रबळ झाले होते. दक्षिणेतल्या तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळहम, आंध्रात तेलगू देसम्, महाराष्ट्रात शिवसेना, उत्तर भारतात कुठे बहुजन समाज, कुठे लोकदल, कुठे समाजवादी, कुठे झारखंड मुक्ती मोर्चा, कुठे अकाली दल यासारखे विकल्प तयार झाले होते. कम्युनिस्टांनी बंगाल आणि केरळ काबीज केला होता. भारतीय जनता पक्षाने दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान वगैरे प्रदेशात चांगला जम बसवला होता. यातल्या निरनिराळ्या पक्षांनी राज्य पातळीवर निवडून येऊन आपापली सत्ता प्रस्थापित केली होती. या सगळ्या गोंधळात निवडणुकीनंतर काय होणार हे एक प्रश्नचिन्हच होते. इंदिरा गांधींनी १९८० साली जशी देशभर सहानुभूती किंवा मान्यता मिळवली होती तशी हवा राजीव गांधी यांना निर्माण करता आली नव्हती. या निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा यश मिळेल असे अजीबात वाटत नव्हते. त्या निवडणुकीचे काही ठिकाणचे मतदान होऊन गेल्यानंतर निवडणुकीच्या प्रचारासाठी तामीळनाडूमध्ये गेलेले असतांना त्यांच्यावर अतिरेक्यांनी घाला घातला. याने सर्व देश हळहळला. काँग्रेसच्या कारभारावर लोक नाराज झालेले असले तरी व्यक्तीशः राजीव गांधी लोकप्रियच होते. त्यांच्या अशा प्रकारे झालेल्या निधनाची प्रतिक्रिया त्यानंतर झालेल्या उरलेल्या जागांच्या निवडणुकींवर झाली. पुन्हा एक सहानुभूतीची लाट आली, यामुळे पारडे फिरले आणि काँग्रेस पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या. तरीसुद्धा त्याला पूर्ण बहुमत मिळाले नाहीच. काँग्रेस खासदारांच्या प्रमुखपदी नरसिंहराव या मुरब्बी नेत्याची निवड करण्यात आली. त्यांनी घोडेबाजारातून काही फुटकळ पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा मिळवला आणि ते पंतप्रधान झाले.

. .  . . . . . . . . . .  (क्रमशः)

----------------------------------------------------

निवडणुका भाग ४


सुमारे सव्वाशे वर्षापूर्वीच्या हिंदुस्तानातल्या काही उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित लोकांनी १८८५ साली 'इंडियन नॅशनल काँग्रेस' या संघटनेची स्थापना केली. त्या काळातल्या इंग्रज सरकारच्या नोकरीतले एक वरिष्ठ अधिकारी अॅलन ऑक्टेव्हियन ह्यूम यांनीच यात पुढाकार घेतला होता. त्या काळातल्या 'एतद्देशीय मनुष्यांची' मते 'कनवाळू' इंग्रज सरकारला कळावीत आणि सरकारला त्यानुसार त्यांचे कल्याण करता यावे असा 'उदात्त उद्देश' त्यामागे होता. यातल्या सदस्यांनी आपापसात चर्चा करावी, काही उपाय किंवा उपक्रम सुचवावेत आणि त्यासाठी मायबाप सरकारकडे अर्ज विनंत्या कराव्यात अशा स्वरूपाचे काम ती संघटना सुरुवातीला करायची. वीस पंचवीस वर्षानंतरच्या काळात त्या संघटनेच्या कामाचे स्वरूप बदलत गेले. 'लाल, बाल, पाल' या नावाने ओळखल्या गेलेल्या लाला लाजपतराय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या झुंजार नेत्यांनी त्या संघटनेत प्रवेश केला आणि तिला नवीन दिशा दिली. त्यानंतर काँग्रेसने सरकारला विनंत्या करून न थांबता मागण्या करायला सुरुवात केली आणि अंतर्गत स्वायत्ततेपर्यंत (होमरूल) त्या वाढवत नेल्या. शिवाय या नेत्यांनी सर्वसामान्य जनतेत मिसळून तिचे संघटन करून त्यांच्या मागण्यांसाठी जनतेचा पाठिंबा मिळवायची सुरुवात केली. त्यांच्यानंतर आलेल्या महात्मा गांधी आणि सरदार पटेल, पं.नेहरू, नेताजी सुभाष आदि त्यांच्या अनुयायांनी सत्याग्रह, चळवळी, आंदोलने वगैरेमधून आपल्या कार्याचा विस्तार भारतभराच्या कानाकोप-यात नेऊन पसरवला, त्या वेळच्या काँग्रेसने देशाच्या संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून तिचा पाठपुरावा केलाच, १९४२ साली इंग्रजांना 'चले जाव' असे सांगितले. तोपर्यंत या संघटनेचे राजकीय पक्षात रूपांतर झाले होते आणि तिचे लक्षावधी कार्यकर्ते खेडोपाड्यांमध्ये विखुरलेले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळेस काँग्रेस हाच राष्ट्रीय स्तरावर विकसित झालेला एकमेव पक्ष होता.

रशीयामध्ये झालेल्या रक्तरंजित क्रांतीनंतर त्या देशात कम्युनिस्टांची राजवट सुरू झाली आणि जगभरातल्या सर्व शोषित वर्गांनी एक होऊन उठाव करावा आणि सरंजामशाही आणि भांडवलशाहीचे या जगातून पुरते उच्चाटन करावे असे जाहीर आवाहन त्यांनी वेळोवेळी केले. त्या क्रांतिकारी विचारप्रवाहाचे वारे भारतापर्यंत येऊन पोचले आणि कम्युनिस्ट पक्षाचे लहानसे रोपटे इथेही उगवले. गिरणीकामगारांच्या युनियनमध्ये आणि तेलंगणासारख्या काही भागांमध्ये त्याला काही अंकुरही फुटले. जहाल समाजवादी विचारसरणी असलेल्या काँग्रेसमधल्या काही गटांनी बाहेर पडून समाजवादी, प्रजासमाजवादी यासारखे नवे पक्ष स्थापन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीमधून वर आलेल्या हिंदुत्ववादी लोकांनी त्यांच्या विचारावर आधारलेला भारतीय जनसंघ स्थापन केला. १९५१ साली भारतातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या तेंव्हा अशा प्रकारे काही इतर पक्ष निर्माण झाले होते, पण त्यांचा प्रभाव फारच मर्यादित प्रदेशांमध्ये होता. भारतात विलीन झालेल्या बहुतेक संस्थानांमधल्या प्रजेची भूतपूर्व संस्थानिकांवर निष्ठा होती. त्याचा फायदा घेऊन ते ही एकाद्या पक्षातर्फे किंवा स्वतंत्रपणे निवडणुकीला उभे राहिले आणि निवडून आले. तरीही या सर्वांना मिळून फक्त १२५ जागा जिंकता आल्या आणि ३६४ जागा जिंकून काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवला.

यापूर्वीच्या भागांमध्ये लिहिल्याप्रमाणे पं.नेहरूंच्या जीवनकाळात झालेल्या १९५७ आणि १९६२ साली झालेल्या पुढील दोन निवडणुकांमध्ये याचीच जवळजवळ पुनरावृत्ती झाली. इंदिरा गांधी पंतप्रधानपदी आल्यानंतर अनेक जुन्या नेत्यांनी पक्ष सोडला किंवा इंदिराजींना पक्षाबाहेर काढले किंबहुना काँग्रेस पक्षाची विभाजने होत गेली. तोपर्यंत देशातल्या परिस्थितीमध्ये बराच फरक पडला होता. स्वातंत्र्याच्या लढाईतले बहुतेक सगळे पुढारी दिवंगत झाले होते किंवा जर्जरावस्थेत पोचले होते. पारतंत्र्याचे दिवस न पाहिलेल्या मतदारांची बहुसंख्या झाली होती. यामुळे स्वातंत्र्ययुद्धातला सहभाग हा महत्वाचा मुद्दा राहिला नव्हता. काँग्रेसमधल्या जुन्या खोडांना वगळले गेले तरी बहुतेक सगळे सक्रिय कार्यकर्ते इंदिराजींच्याच बाजूला राहिले. तरीही या फाटाफुटीचा परिणान होऊन १९६७ सालच्या निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेसच्या खासदारांची संख्या ३००च्या आत आली, पण ती बहुमतासाठी पुरेशी होती. १९७१ सालच्या युद्धानंतर इंदिरा गांधींना मिळालेल्या अफाट लोकप्रियतेमुळे काँग्रेसच्या खासदारांची संख्या पुन्हा पूर्वीसारखी साडेतीनशेवर गेली. आणीबाणीनंतर झालेल्या १९७७च्या निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेस पक्ष अल्पमतात आला खरा, पण तीनच वर्षांनंतर झालेल्या मध्यावधी निवडणुकीत त्याने पुन्हा उसळी मारून ३५० चा आकडा पार केला. १९८४ साली इंदिरा गांधींच्या दुर्दैवी हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने प्रथमच ४०० चा आकडा ओलांडून लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आणि इतर सगळ्या राष्ट्रीय पक्षांचा पुता धुव्वा उडवला.

त्यानंतर मात्र भारताच्या राजकारणात एक नवे पर्व सुरू झाले. १९८९ ते २००९ च्या दरम्यानच्या वीस वर्षांमध्ये पाचच्या ऐवजी सात सार्वत्रिक निवडणुका झाल्या, पण त्यातल्या एकाही निवणुकीत कोणत्याच पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेच नाही. दर वेळी इतर पक्षांचे सहाय्य घेऊन मंत्रीमंडळ बनवले गेले आणि त्यातली काही थोडे दिवसच चालली. या काळात सात पंतप्रधान झाले, त्यातल्या नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहनसिंग या तीघांनी पाच वर्षाचा कालावधी पूर्ण केला, पण अटलजींचेसुद्धा पहिले मंत्रीमंडळ १३ दिवसातच गडगडले होते. विश्वनाथप्रतापसिंह, चंद्रशेखर, देवेगौडा आणि आय. के. गुजराल या इतर चौघाचा कारभार एक वर्षसुद्धा टिकला नाही. ज्यांनी पाच वर्षे पूर्ण केली त्यांची सरकारेदेखील इतर पक्षांच्या सहाय्यानेच चालली असल्यामुळे त्यांच्या डोक्यावर सतत टांगती तलवार असायचीच. वरील चौघे आणि त्यापूर्वी पंतप्रधान झालेले मोरारजीभाई देसाई व चरणसिंह हे सगळे काँग्रेसमधूनच पुटून बाहेर पडलेले होते. याचा अर्थ असा की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत अटलबिहारी वाजपेयी वगळता इतर सगळे पंतप्रधान आजी किंवा माजी काँग्रेसमनच होते.

गेली पंचवीस वर्षे कोणत्याही एका पक्षाला लोकसभेत बहुमत मिळालेले नव्हते. यामुळे बहुपक्षी राज्यकारभार चालला होता. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए (युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स) या नावाची आघाडी निर्माण केली गेली, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली एनडीए (नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स) ही आघाडी तयार झाली. यातल्या काही घटकपक्षांची संख्या आणि नावे बदलत गेली. पण त्याने लक्षणीय फरक पडला नाही. याशिवाय सगळ्या डाव्या पक्षांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी करण्याचे प्रयत्नही अनेक वेळा केले गेले, त्यांना फारसे यश कधीच मिळाले नाही.

.  . . . ..  . .. .  . . . . . (क्रमशः)

---------------------------------------------

निवडणुका ५

१९८९ आणि १९९१ साली झालेल्या निवडणुकांच्या आठवणी मी आधी दिल्या आहेत. १९९१ साली बहुमत मिळाले नसतांनाही पंतप्रधानपदावर आलेल्या नरसिंहराव यांना अनेक अडचणी आल्या. त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांवर वादळे उठली, त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात आले, त्यांचे काही वरिष्ठ साथी पक्ष सोडून गेले तर काही मित्रपक्षांनी पाठिंबा काढून घेतला. तरीही नरसिंहराव यांनी या सर्वांना तोंड देत आपली गादी पाच वर्षे कशीबशी सांभाळली. तोपर्यंत स्वातंत्र्यप्राप्तीला चार दशके उलटून गेली असल्यामुळे स्वातंत्र्यलढ्यातला सहभागी झालेले बहुतेक नेते आणि तो लढा पाहिलेले बहुतेक मतदार काळाच्या पडद्याआड गेले होते. या तथाकथित स्वातंत्र्यसैनिकांनी सत्तेवर आल्यानंतर केलेला ऐषोआरामच नव्या पिढीतल्या लोकांनी पाहिला असल्यामुळे त्यांचे मत विरोधातच गेलेले होते. शिवाय पूर्वीच्या काँग्रेसमधले कित्येक लोक विरोधी पक्षांमध्ये गेले होते. यामुळे एके काळी स्वातंत्र्ययुद्धासाठी केलेला त्याग, भोगलेला तुरुंगवास आणि निवडलेले कष्टमय जीवन हा काँग्रेसच्या बाजूचा मुद्दाच राहिला नव्हता. या काळात काँग्रेस पक्षाची पीछेहाट होत राहिली.

याच्या उलट या काळात भारतीय जनता पार्टीचे बळ वाढत गेले. या पक्षाला १९९१च्या निवडणुकीत १२० जागा मिळाल्या होत्या. १९७७ चा अपवाद वगळता यापूर्वी कोणत्याही विरोधी पक्षाला इतके यश मिळाले नव्हते. आपली वाढत असलेली ताकत पाहून भाजपमध्ये जास्त चैतन्य आले आणि आपली लोकप्रियता वाढवण्याच्या दिशेने त्यांचे जोराचे प्रयत्न सुरू झाले. रामजन्मभूमीवर राममंदिर बांधण्यासाठी आंदोलन सुरू झाले, मोठा गाजावाज करून रथयात्रा काढण्यात आली आणि तिला जनतेकडून भरघोस प्रतिसादही मिळाला. त्या आंदोलनाची परिणती अयोध्या येथील बाबरी मशीदीचा ढाँचा उध्वस्त करण्यात झाली. या घटनेच्या प्रतिक्रिया देशभर होत राहिल्या. यामुळे वातावरण तापत राहिले. या सर्वांचा परिणाम १९९६ च्या निवडणुकांवर किती होणार आहे हे प्रश्नचिन्ह सर्वांच्या मनात होतेच. या वेळच्या निवडणुकीच्या निकालाबद्दल काहीच खात्रीपूर्वक सांगता येत नव्हते. सर्वांच्या मनात त्याबाबत खूप उत्सुकता होती. निकालजाहीर झाले तेंव्हा या वेळी भाजपला १६१ जागा मिळाल्या, त्या काँग्रेसला मिळालेल्या १४० हून जास्त असल्याने भाजपला पहिल्यांदाच लोकसभेत सर्वाधिक जागा मिळाल्या. त्या पक्षाला सरकार बनवण्याची संधी दिली गेली आणि अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. लोकसभेतले आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना १५ दिवसांची मुदत दिली गेली, पण त्या मुदतीत त्यांना बहुसंख्या जमवता न आल्याने त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही मुख्य पक्षांना वगळून संयुक्त आघाडीच्या (युनायटेड फ्रंटच्या) देवेगौडा यांना आणि त्यानंतर इंद्रकुमार गुजराल यांना पंतप्रधान बनवले गेले. पण पूर्वीच्या अशा प्रकारच्या खिचडी सरकारांचा अनुभव पाहता हा प्रयोग यशस्वी होण्यासारखा नव्हताच. त्या दोघांनाही पुरते एक एक वर्षसुद्धा आपले पद सांभाळता आले नाही. यामुळे १९९८ साली मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागल्या.

या निवडणुकीत उतरण्यापूर्वी भारतीय जनता पार्टीने काही प्रादेशिक मित्रपक्षांची जुळवाजुळव करून एनडीए (नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स) ही आघाडी तयार केली. या निवडणुकीत भाजपाच्या जागांची संख्या वाढून १८२ वर गेली आणि एनडीए (नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स) आघाडीला बहुमत मिळून अटलबिहारी वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले. पण दीड वर्षांनंतर अण्णा द्रमुकने आपला पाठिंबा मागे घेतल्यामुळे ते सरकार अल्पमतात आले. त्यांच्या मंत्रिमंडळावर अविश्वास दाखवणारा ठराव लोकसभेच्या अधिवेशनात अवघ्या एका मताने मंजूर झाला. त्यांनी १९९९ साली पुन्हा मध्यावधी निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला.

१९९९ सालची निवडणूकसुद्धा खूप अटीतटीची झाली. या निवडणुकीच्या आधी होऊन गेलेल्या कारगिलच्या युद्धाने भाजप सरकारची प्रतिमा थोडी उजळली होती. १९९९ च्या निवडणुकांच्या वेळी एनडीएने २० पक्षांना एकत्र आणून भक्कम आघाडी तयार केली. या उलट शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस काढली होती. यामुळे काँग्रेसला तोपर्यंत झालेल्या कुठल्याही निवडणुकीतल्याहून कमी म्हणजे फक्त ११४च जागा मिळाल्या. भाजपच्या जागांचा आकडा पूर्वी एवढा १८२ वरच राहिला असला तरी त्यांच्या आघाडीला चांगले बहुमत मिळाले, पण समता, ममता आणि जयललिता यांच्या मर्ज्या सांभाळून काम करणे ही थोडी तारेवरची कसरतच होती. तरीही अटलजींच्या सरकारने पूर्ण पाच वर्षे राज्यकारभार केला. या काळात त्यांनी चांगली म्हणण्यासारखी कामगिरी केली. पण ती कदाचित अपेक्षेइतकी चांगली झाली नसावी.

२००४ च्या निवडणुकीला एनडीए (नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स) जरा जास्तच आत्मविश्वासाने सामोरी गेली. समाजाच्या मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय स्तरावरील लोक या सरकारवर खूष असल्यामुळे एक फील गुड फॅक्टर तयार झाला होता, तो या सरकारला सहजपणे तारून नेईल अशी त्याच्या नेत्यांची कल्पना होती. कदाचित या कारणाने त्यांनी आवश्यक तेवढा दमदार प्रचार केला नसावा. एनडीए सरकारचे धोरण साधारणपणे उजवीकडे झुकणारे असल्यामुळे ते देशातल्या गरीब जनतेला तितकेसे पसंत पडले नसावे, स्थानिक प्रश्नांमुळे प्रादेशिक मित्रपक्षांची कामगिरी अपेक्षेइतकी चांगली झाली नसावी. या सगळ्या कारणांमुळे  २००४ च्यानिवडणुकीचे परिणाम मात्र धक्कादायक निघाले. भाजपच्या खासदारांची संख्या १८२ वरून १३८ वर खाली आली आणि काँग्रेसची ११४ वरून १४१ पर्यंत वाढली. दोन्ही आघाड्या बहुमतापर्यंत पोचल्या नव्हत्याच आणि पुन्हा एकदा अस्थिरता आली होती. पण डाव्या पक्षांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावरून आपले वजन यूपीए (युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स)च्या पारड्यात टाकले. राजकारणात फारसे सक्रिय नसलेल्या अर्थशास्त्री मनमोहनसिंग यांना पंतप्रधानपदी निवडण्यात आले. त्यांनी देशाचे आर्थिक धोरण मागून पुढे चालू ठेवले आणि काही प्रमाणात प्रगती घडवून आणली.

त्यानंतर २००९ साली झालेल्या निवडणुकीमध्येही अटीतटीच्या लढती झाल्या. तरीही कदाचित त्या सरकारविरुद्ध लोकांना जास्त रोष वाटत नसल्यामुळे त्यांनी जास्त उत्साह दाखवला नाही. या निवडणुकीत अॅटाइन्कम्बन्सी फॅक्टर दिसला नाही. काँग्रेस पार्टी आपली संख्या १४१ वरून २०६ पर्यंत वाढवण्यात यशस्वी झाली. भाजपचे संख्याबल कमी होऊन ११६ वर आले. या वेळीही कोणताच पक्ष बहुमतात आला नाही, हंग पार्लमेंटच निवडून आले होते, पण यूपीए (युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स) च्या जागा वाढल्यामुळे त्यांचे इतर फुटकळ पक्षांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी झाले. हे सरकार पाच वर्षे टिकले पण या काळात ते लोकांना अधिकाधिक अप्रिय होत गेले.
 . . .  . . . . . .  . . . . . . . . . .  .  (क्रमशः)

---------------------------------------------

निवडणुका भाग ६

२००८ साली अमेरिकेत झालेली निवडणूक ऐतिहासिक ठरली. त्या निवडणुकीत पहिल्यांदाच बरॅक ओबामा हा सावळ्या वर्णाचा माणूस अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून निवडून आला. त्या काळात मी अमेरिकेत होतो. त्या काळातली परिस्थिती मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. ती अर्थातच भारतातल्या त्यापूर्वी पाहिलेल्या कोणत्याही निवडणुकीपेक्षा वेगळी होती.

अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निवडणुकीची चक्रे वर्षभर आधी फिरू लागतात. रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटिक या दोन्ही मुख्य पक्षातर्फे ही निवडणूक कुणी लढवायची हे ठरवण्यासाठी प्राथमिक फे-या (प्रायमरीज) सुरू होतात. डेमॉक्रॅटिक पक्षामधल्या काही लोकांची नावे आधी समोर आली, त्यातली बरीचशी वगळून अखेर बरॅक ओबामा आणि हिलरी क्लिंटन ही दोन नावे शिल्लक राहिल्यानंतर त्यातून एक निवडण्यासाठी प्रत्येक राज्यात पक्षांतर्गत डेलेगेट्समधून निवडणूकी घेण्यात आल्या. या निवडणुका सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणे एकाच दिवशी होत नाहीत. एकेका राज्याचे निकाल जसे जाहीर होत होते तशी परिस्थिती बदलत होती. आज हिलरी क्लिंटन पुढे आहेत तर दुसरे दिवशी लागलेल्या निकालांनुसार बरॅक ओबामा पुढे गेले आहेत असा सस्पेन्स काही दिवस चालल्यानंतर हिलरी क्लिंटन यांनी त्याचा रागरंग पाहिला आणि माघार घेऊन ओबामांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्या ओबामांच्या पाठीशी भक्कमपमे उभ्याही राहिल्या. रिपब्लिकन पक्षातर्फे जॉन मॅकेन यांची उमेदवारी जाहीर झाली.

मी अमेरिकेत पोचलो तोपर्यंत निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली होती. पण मोठमोठी छायाचित्रे असलेले अवाढव्य फलक मला कुठल्याच गावातल्या रस्त्यात लावलेले कोठेही दिसले नाहीत की ध्वनीवर्धकांचा कर्कश गोंगाटही कुठे ऐकू आला नाही. अल्फारेटाच्या मी रहात असलेल्या भागात तरी कधीच कोणाची मिरवणूक निघाली नाही की जाहीर सभा झाली नाही. न्यूयॉर्क आणि शिकागोसारख्या महानगरांमध्ये काही ठिकाणी सभा होत असत आणि त्याचे वृत्तांत टी.व्ही.वर दाखवत होते. त्याखेरीज टी.व्हीवरील कांही चॅनेल्सवर निवडणुकीनिमित्य सतत कांही ना कार्यक्रम चाललेले असायचे. प्रचाराचा सर्वाधिक भर बहुधा टी.व्ही.वरच होता. ओबामा आणि सिनेटर मॅकेन यांच्या वेगवेगळ्या तसेच अमोरासमोर बसून घेतलेल्या मुलाखतीसुध्दा झाल्या. २००८ साली फेसबुक किंवा ट्विटर अजून अवतरले नव्हते.

प्रेसिडेंट बुश यांच्या कारकीर्दीत अमेरिका आर्थिक संकटात सापडली असा सर्वसामान्य जनतेचा समज झाला होता. पण त्याचे मोठे भांडवल करण्याचा मोह ओबामा टाळायचे. "प्राप्त परिस्थितीतून बाहेर येऊन पुन्हा आपले गतवैभव प्राप्त करण्याची अमेरिकन जनतेला गरज आहे आणि आपण सर्वांनी मिळून ते काम करायचे आहे." असे सकारात्मक प्रतिपादन ते करायचे. मॅकेन यांनी मात्र ओबामांच्या भाषणावर आसूड ओढण्याचेच काम मुख्यतः केले. त्यांच्या भाषणातही सारखे ओबामा यांचेच उल्लेख यायचे. ओबामा हे मिश्र वंशाचे आहेत याचा जेवढा गवगवा प्रसारमाध्यमांनी केला तेवढाच त्याचा अनुल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. "मी सर्व अमेरिकन जनतेचा प्रतिनिधी आहे." असेच ते नेहमी सांगत आले. त्यांनी विचारपूर्वक घेतलेल्या या धोरणाचा त्यांना चांगला फायदा झाला असणार. एकजात सर्व गौरेतरांचा भरघोस पाठिंबा त्यांना मिळालाच, पण सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे असंतुष्ट असलेले बहुसंख्य गौरवर्णीयही मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूला आल्यामुळे ते प्रचंड बहुमताने निवडून आले.

अमेरिकेतल्या या निवडणुकीत आणि २०१४ साली झालेल्या भारतातल्या लोकसभेच्या निवडणुकीत बरेच साम्य दिसल्यामुळे मला त्या आठवल्या. अमेरिकेत जसा ओबामा यांना आधी त्यांच्या पक्षामधूनच तीव्र विरोध होत होता तसाच भारतात नरेन्द्र मोदी यांनासुद्धा झाला. ओबामांनी अत्यंत शांतपणे आणि मुत्सद्देगिरीने त्या विरोधावर मात केली आणि इतर प्रतिस्पर्ध्यांना बाजूला सारले तसेच मोदींनी केले. भारताच्या भावी पंतप्रधानाचे नाव निवडणुकीच्या आधीपासून जाहीरपणे सांगण्याची आवश्यकता नसतांनासुद्धा या वेळेस भारतीय जनता पक्षाने निवडणूक जिंकली तर नरेन्द्र मोदीच पंतप्रधान होतील असे त्यांनी सर्वांकडून वदवून घेतले. बुशच्या राजवटावर बहुतेक अमेरिकन जनता असंतुष्ट होती, काही प्रमाणात ती चिडलेली होती, त्याचप्रमाणे भारतातली बरीचशी जनता मनमोहनसिंगांच्या सरकारच्या कारभारामुळे वैतागली होती. अमेरिकेत थेट राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत असल्यामुळे ती नेहमीच व्यक्तीकेंद्रित होत असते, भारतातल्या निवडणुकांमध्ये एका पक्षाला निवडून द्यायचे असे ठरलेले असले तरी पं.नेहरू आणि इंदिरा गांधींच्या काळात त्या व्यक्तीकेंद्रित झाल्या होत्या. त्यानंतर २०१४ साली भारतीय जनता पक्षाने केलेल्या प्रचारात त्या पक्षाऐवजी नरेंद्र मोदी यांच्या नावावरच अधिक भर दिला गेला. "अबकी बार मोदी सरकार" हा त्यातला मुख्य नारा होता. ओबामा यांच्याप्रमाणेच  नरेन्द्र मोदीसुद्धा फर्डे वक्ते आणि अत्यंत संभाषणचतुर आहेत. ओबामांच्या मानाने मॅकेन फिके पडत होते, मोदींच्या विरोधात काँग्रेसचा चेहेरा म्हणून उभे केले गेलेले राहुल गांधी या बाबतीत फारच कमी पडत होते. ओबामांनी झंझावाती दौरे करून जास्तीत जास्त अमेरिकन मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर मोहनास्त्र टाकून त्यांना आपल्या बाजूला ओढून घेतले. नरेंद्र मोदींनी तर या अस्त्राचा यशस्वी वापर ओबामांपेक्षाही जास्त प्रभावीपणे केला.

पोस्टर्स, मिरवणुकी, सभा, घरोघरी जाऊन प्रचार वगैरे सर्व प्रकारचा प्रचार २०१४ मधल्या भारतातल्या निवडणुकीमध्ये झालाच, विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे त्यात अधिक सुधारणा होऊन जास्त वाढ झाली. पक्षाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, राज्यातले, जिल्ह्यातले, तालुक्यातले प्रमुख, गावातले आणि गल्लीतले म्होरके या सगळ्यांच्या चेहे-यांच्या भाऊगर्दीत कुठे तरी उमेदवाराचा सुहास्य मुखडा दाखवणारे अगडबंब फ्लेक्स सगळ्याच पक्षांतर्फे कोप-याकोप-यांवर लावले गेले होते. त्यांच्यात काही फरक आहे असे निरखून पाहिल्याशिवाय जाणवत नव्हते. त्या उमेदवाराच्या जिंकण्याची खात्री असो, आशा असो किंवा डिपॉझिटसुद्धा राखण्याची शक्यता नसो, त्याचा मुखडा फलकांवरून मतदारांना आवाहन करत असतांना दिसायचा. मिरवणुका काढण्यासाठी आणि घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी चार लोकांचे जमणे आवश्यक असल्यामुळे हे काम मोठे पक्षच करू शकत होते. सहा वर्षांपूर्वी अमेरिकेत पाहिलेल्या टीव्ही वरच्या प्रचाराइतकाच किंवा त्याहून कांकणभर जास्तच प्रचार भारतात होत होता, पण त्याची क्वालिटी मात्र जेमतेमच होती. एकादे आकर्षक घोषवाक्य घेऊन ते सतत कानावर आदळत राहण्याचा इतका अतिरेक झाला होता की त्यावरील विडंबनांचे पेव फुटले होते. यावेळी मोठ्या पक्षांनीही त्यांच्या प्रचारासाठी इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला होता. फेसबुक, ट्विटर आणि वॉट्सअॅपवरील संवादांना दुसरा कुठला विषयच नसावा असे वाटत होते. त्यावर कोणीही काहीही लिहू शकतो असा समज असल्यामुळे बेछूट विधाने आणि त्यांवर त्याहून भयानक वादविवावाद यांना ऊत आला होता. सेलफोनवर अनाहूत टेक्स्ट मेसेजेसचा वर्षाव होत होता. अर्थातच या सगळ्यांचा थोडा फार तरी परिणाम निवडणुकांवर झाला असणारच..


दोन्ही वेळेस झालेल्या निवडणुकांचे निकाल पहाण्याची जबरदस्त उत्सुकता सर्वांच्या मनात होती. आम्ही अमेरिका या परदेशाचे नागरिक नव्हतो आणि तिकडे कोणीही निव़डून आले तरी आम्हाला त्याचे कसले सोयरसुतक असण्याचे काही कारण नव्हते. तरीसुद्धा निवडणूक संपल्यानंतर तिच्या निकालांची वेळ होताच आम्ही टेलिव्हिजनच्या समोर ठाण मांडून बसलो होतो आणि डोळ्याची पापणी लवू न देता त्याच्याकडे पहात आणि कान टवकारून निवेदने ऐकत बसलो होतो. २०१४ सालच्या भारतातल्या निवडणुका तर आमचाच भाग्यविधाता ठरवणार होत्या. सर्वांना त्याबद्दल वाटणारी उत्सुकता अनावर होती. पण इथल्या निवडणुका झाल्यानंतर मतमोजणीसाठी मध्ये कित्येक दिवस वाट पहावी लागली होती या गोष्टीचा राग येत होता. निकालाचा दिवस उजाडल्यावर सगळी कामे कशीबशी आटोपून किंवा न आटोपताच आम्ही टेलिव्हिजनकडे धाव घेतली आणि निरनिराळ्या वाहिन्यांवरून दाखवण्यात येत असलेली तीच तीच दृष्ये दिवसभर पहात आणि तेच तेच बोलणे ऐकत राहिलो. अमेरिकेतल्या निवडणुकींमध्ये ओबामा निवडून येतील असे भविष्य बहुतेक सगळ्या पंडितांनी वर्तवलेले असल्यामुळे त्याची अपेक्षा होतीच, पण त्यांना इतके मोठे मताधिक्य मिळेल असे वाटत नव्हते. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीए (नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स) ही आघाडी सर्वाधिक जागा मिळवेल इतका अंदाज होता, पण सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाची पार वाताहात होईल असे वाटले नव्हते. या निवडणुकीमध्ये एनडीएला भरघोस यश मिळालेच, पण त्याचा घटक असलेल्या भाजपला स्वतःला बहुमत मिळाले हे त्यांचे यश अपेक्षेच्या पलीकडले होते.

पंचवीस वर्षांचा अनिश्चिततेचा काळ उलटल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या देशाला स्थिर सरकार मिळणार आहे यातही एक समाधान होते.

.  . . . . . . . . . . . . (समाप्त)

Sunday, August 31, 2014

गणेशोत्सवानिमित्य


तुझ्या कांतिसम रक्‍तपताका पूर्वदिशी फडकती।
अरुण उगवला, प्रभात झाली, ऊठ महागणपती ।।

सूर्याआधी दर्शन घ्यावे तुझे मूषकध्वजा ।
शुभद सुमंगल सर्वाआधी तुझी पाद्यपूजा ।
छेडुनि वीणा जागविते तुज सरस्वती भगवती ।।

आवडती तुज म्हणुनि आणिली रक्‍तवर्ण कमळे ।
पांचमण्याच्या किरणांसम ही हिरवी दुर्वादळे ।
उभ्या ठाकल्या चवदा विद्या घेउनिया आरती ।।

शुर्पकर्णका, ऊठ गजमुखा, उठी रे मोरेश्वरा ।
तिन्ही जगांचा तुच नियंता, विश्वासी आसरा ।
तुझ्या दर्शना अधीर देवा हर, ब्रम्हा, श्रीपती ।।

                    स्व. ग. दि. माडगूळकर

दर वर्षी गणेशोत्सवाच्या वेळी  एकादा मुद्दा (थीम) घेऊन त्यावर लिहायचे ठरवले होते. या वर्षी तीन दिवस उलटून गेले तरी या ब्लॉगवर यायला वेळच मिळत नव्हता. त्यामुळे या सुंदर भूपाळीने सुरुवात करून हे पान उघडले आहे. आता जसे सुचेल, जमेल तसे या पानावरच रोज लिहायचे असे ठरवले आहे.

दर वर्षी गणेशोत्सवाच्या वेळी  एकादा मुद्दा (थीम) घेऊन त्यावर लिहायचे ठरवले होते. या वर्षी तीन दिवस उलटून गेले तरी या ब्लॉगवर यायला वेळच मिळत नव्हता. त्यामुळे या सुंदर भूपाळीने सुरुवात करून हे पान उघडले आहे. आता जसे सुचेल, जमेल तसे या पानावरच रोज लिहायचे असे ठरवले आहे.

मी शाळेत शिकत असतांना दरवर्षी गणेशचतुर्थी हा एकमेव सण आमच्या हायस्कूलमध्ये धूमधडाक्यात साजरा होत असे. इतर सणवारांसाठी फक्त सुटी असे. त्या दिवशी ते सण घरीच साजरे केले जात असत. गणेशचतुर्थीच्या दिवशी मात्र आपापल्या घरातले गणपती बसवून झाले की सगळी मुले शाळेकडे धाव ठोकत असत. घरून निघायला उशीर झाला तर गावात जिथे कुठे आमच्या शाळेची मिरवणूक चालत असेल तिथे येऊन त्यात सामील होत असत. ढोल ताशा, झांजा वगैरेंच्या आवाजावर "गणपती बाप्पा मोरया"चा घोष करत आमची वानरसेना गणपतीच्या मूर्तीसह गावात फिरून शाळेत येत असे. तिथल्या सेंट्रल असेंब्ली हॉलमध्ये त्या मूर्तीची स्थापना केली जात असे. त्या काळात ज्या वस्तू आजूबाजूच्या निसर्गात किंवा स्थानिक बाजारात उपलब्ध असायच्या त्यामधून सजावट केलेली असायची. शाळेचा हॉल तर मुलांनी गच्च भरलेला असायचा त्याच्या पुढच्या बाजूचा कॉरीडॉर मुलांनी आणि मागच्या बाजूचा मुलींनी भरलेला असायचा. पूजा, आरती वगैरे करून चिमूटभर प्रसाद खाऊन घरी गेल्यावर संध्याकाळी पुन्हा सगळे शाळेत येत. त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा वाजत गाजत आणि फटाके उडवत गणपतीची मिरवणूक निघे पण ती फक्त शाळेच्या आवारातच असलेल्या विहिरीपर्यंतच जात असे. तिथे पोचल्यावर पट्टीचे पोहणारी चार पाच मुले गणपतीच्या मूर्तीला हातात धरून पाय-यांवरून खाली उतरत आणि पाण्यात बुडी घेऊन विहिरीच्या पार तळापर्यंत पोचत आणि तिला अलगदपणे तळाशी ठेऊन वर येत असत. बाकीची काही मुले पाय-यावर तर काही काठावर उभी राहून ते दृष्य पहात असत. शिक्षकवर्ग फक्त मार्गदर्शन करण्यापुरते काम करत असत, मुख्य हौस मुलांचीच असे. शाळेतल्या गणपतीचे विसर्जन करून झाल्यावर सगळेजण आपापल्या घरातल्या गणपतीच्या संध्याकाळच्या आरतीच्या तयारीला लागत.

असा अर्ध्याच दिवसाचा गणपती मी फक्त आमच्या शाळेतच पाहिला. आमच्या गावात काही लोकांकडे दीड दिवसांचा, कुणाकडे तीन, पाच किंवा सात दिवसांचा असायचा. काही लोकांकडे बाप्पाचा मुक्काम अनंतचतुर्दशीपर्यंत असायचा तर काही लोकांचे गणपती गौरीसोबत जायचे. ते सहा किंवा सात दिवस रहात असत. गणेशोत्सवाच्या बाबतीतले हे वैविध्य मुंबईतसुद्धा दिसते. दीड दिवसांचा गणपती उत्सव साजरा करणा-या एकाला त्याच्या मित्राने विचारले, "तुम्ही लोक इतके कसे रे चिक्कू? गणपती आला ना आला तेवढ्यात त्याला निरोप देऊन मोकळे होता. आम्ही बघा कसे बाप्पाला चांगले दहा दिवस आमच्याकडे ठेवून घेतो."
त्यावर पहिला मित्र म्हणाला, "बरं तू साग, गणपती हा काय देणारा देव आहे?"
"बुद्धी देणारा."
"मग त्यासाठी आम्हाला दीड दिवस पुरेसे आहेत, तुम्हाला लागत असतील बाबा दहा बारा दिवस."

ज्या गणपतींचे विसर्जन दुस-या दिवशी केले जाते त्यांना दीड दिवसाचा असे कदाचित खिजवण्यासाठी म्हणत असतील, पण तिस-या दिवशी विसर्जन होत असलेल्या गणपतींना मात्र अडीच दिवसाचे न म्हणता तीन दिवसाचे असे का म्हणायचे हे गणित मला कधी समजले नाही. दीड, अडीच असे करत हाच क्रम पुढे वाढवत नेला तर मग साडे चार, साडेसहा, साडे नऊ असे आडमोडी आकडे येतील म्हणून कदाचित अडीच दिवसांना राउंड ऑफ करून तीन दिवस म्हंटले जात असेल. आमच्या घरातला गणपती मात्र मोजून पाच दिवसांचाच असायचा. ही प्रथा माझ्या वडिलांनी सुरू केली की आजोबांनी की पणजोबांनी ते माहीत नाही. आमच्या लहानपणी असले प्रश्न मनात उठले तरी ते विचारायची कोणाची प्राज्ञा नसायची. मी मात्र माझ्या मुलांना सांगण्यासाठी एक एक्स्प्लेनेशन तयार केले.

गणपतीची आरास आणि इतर तयारी करण्यात बराच वेळ खर्च केला जातो, सजावट करण्यात हौसेने कलाकुसरत केली जाते, नवनवीन कल्पनांना आकार दिला जातो. आपले कलाकौशल्याचे काम चार लोकांनी येऊन पहावे असे वाटते. गावातली मित्र मंडळी, नातेवाईक वगैरे लोक या निमित्याने भेटायला येतात. त्यांना सवडीने येऊन जायला थोडी फुरसत द्यायला पाहिजे. घरातल्या सर्वांनी मिळून एकत्र जमून गजाननाची पूजा, आरती वगैरे करण्यात थोडी मजा येऊ लागलेली असते. ती गोडी दीड दोन दिवसात संपवून टाकावी असे वाटत नाही. असे असले तरी या उत्सवाच्या दिवसात रोजच्या भरगच्च कामांमध्ये या कार्यक्रमांची भर पडलेली असते. शाळा, ऑफीस वगैरेंची व्यवधाने सांभाळून ते सगळे कार्यक्रम अगदी साग्रसंगीत रीतीने रोज नियमितपणे करणे जास्त दिवस अशक्य नसले तरी कठीण असते. शिवाय घरात गणपती बसलेला असतांना शक्य तोवर कोणी ना कोणी नेहमी घरात हजर राहण्याची गरज असते. त्या काळात मला अनेक वेळा फिरतीवर परगावी जावे लागत असे, ते जास्त दिवस पुढे ढकलता येत नसे. या सगळ्याचा विचार करता घरातल्या गणेशोत्सवासाठी पाच दिवस हा चांगला आणि ऑप्टिमम पीरियड वाटतो. बाप्पासाठी काही करत असल्याचे समाधानही मिळते आणि त्याचा ताणही पडत नाही. हे लॉजिक मुलांना बहुधा पटले असावे.   

Monday, August 18, 2014

ब्रह्मकुमारींचे रक्षाबंधन



पूर्वीच्या काळात दक्षिण महाराष्ट्र किंवा उत्तर कर्नाटकाच्या आमच्या प्रदेशात रक्षाबंधनाचा प्रघात नव्हता. माझ्या लहानपणी श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हणत असत. आमच्या गावापासून समुद्रकिनाराही शेकडो मैल दूर असल्यामुळे त्या दिवशी समुद्रावर जाण्याचा प्रश्नच नव्हता. कदाचित दहा पिढ्यांपूर्वी कोकणात राहणारे आमचे पूर्वज समुद्राला नारळ अर्पण करतही असतील, आम्ही फक्त नारळीभात खात असू. समुद्रकिनारा खूप दूर आणि पावसाचे प्रमाणही कमी असल्यामुळे त्या भागात नारळाचे उत्पादन होत नसे. ओले खोबरे हा आमच्या घरातल्या रोजच्या जेवणातला भाग नव्हता, कधी तरी ते खाणे हा थोडासा चैनीचा भाग होता. सणावारी केलेल्या मोदक, करंज्या वगैरेतून थोडेसे खोबरे खायला मिळत असे आणि एकाद्या पूजेसाठी किंवा देवदर्शनाच्या वेळी नारळ फोडला गेला तर चटणी, भाजी, आमटीमध्ये खोबरे घालून त्यांची चंव वाढवली जात असे. त्यामुळे पोटभर नारळीभात म्हणजे एक मेजवानी होती आणि हा योग वर्षातून एकदाच येत असल्याने त्याचे मोठे अप्रूप वाटायचे.

त्या काळात संघात जाणारे माझे शाळेतले मित्र श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी शाखेत जाऊन त्यांच्या झेंड्याला राखी बांधायचे. राष्ट्रध्वज नसल्यामुळे तो कशाचे प्रतीक होता आणि माझे मित्र त्याचे रक्षण करणार म्हणजे ते काय करणार आहेत हे काही त्यातल्या कोणाला सांगता येत नसे. शिवाय झेंडा हा शब्द पुल्लिंगी असल्यामुळे त्याला राखी बांधणारे माझे मित्र त्याच्या बहिणी ठरणार म्हणजे कुणी कुणाचे रक्षण करायचे असा घोळ होत असे. मी त्या मार्गाने गेलो नसल्यामुळे त्याबद्दल जास्त विचार केला नाही. जुन्या काळातली लोकप्रिय नटी बेबी नंदा हिची प्रमुख भूमिका असलेला छोटी बहन हा सिनेमा तुफान लोकप्रिय झाल्यानंतर "भैया मेरे राखीबंधनको निभाना" हे त्या सिनेमातले गाणे लोकांच्या ओठावर आले आणि उत्तर भारतातल्या या सणाचा अखिल भारतात प्रसार झाला. त्यापूर्वी दक्षिणेत हा सण फारसा कोणी पाळत नव्हते. माझ्या लहानपणी आमच्या गावातल्या बाजारात राख्या मिळतही नसत. विणकाम, भरतकाम वगैरे करण्यासाठी घरात आणलेल्या रेशमाच्या धाग्यांपासून मुलींनी घरच्या घरीच राख्या तयार करून घरातल्या आपल्या भावांच्या मनगटावर त्या बांधायला तेंव्हा नुकतीच सुरुवात झाली होती. त्याची व्याप्ती फार तर गावातल्या अगदी जवळच्या नातेवाईकांपर्यंत होत असे. लग्न करून सासरी गेलेल्या बहिणी माहेरपणासाठी श्रावणात माहेरी आल्या असल्या तरच त्यांचा भावाला राखी बांधायचा कार्यक्रम होत असे.

नोकरीला लागल्यानंतरसुद्धा माझ्या बहिणींबरोबर भाऊबीज हा सण मी दरवर्षी नियमितपणे साजरा करत होतो, पण रक्षाबंधन मात्र अगदी क्वचित प्रसंगीच करून घेतले असेल. आमच्या घरी तशी प्रथाच नव्हती. माझी मुले मात्र त्यांच्या चुलत, मावस, आत्ते, मामे बहिणींकडून दरवर्षी राखी बांधून घ्यायला लागली. ती जन्माला आलेल्या वर्षापासूनच त्यांच्या या बहिणींच्या राख्या पोस्टाने यायला सुरुवात झाली आणि त्यांची संख्या वाढत गेली. हा सण अखिल भारतात साजरा व्हायला सुरुवात झाली असली तरी आमच्या ऑफिसला त्या दिवशी सुटी नसायची. माझे उत्तर भारतीय सहकारी कपाळाला कुंकवाचे उभे पट्टे ओढून आणि मनगटापासून कोपरापर्यंत मोठमोठ्या राख्यांची माळ बांधून ऑफिसात यायचे, काही जण मिठाईचे बॉक्सही आणायचे आणि त्यातल्या मोतीचुराच्या लाडवांचे किंवा बर्फीचे तुकडे आम्हाला वाटायचे. त्या दिवशी मला आपले मनगट ओकेबोके वाटायचे, पण कुणाला तरी बळेबळेच बहीण मानून तिच्याकडून राखी बांधून घ्यावी असे मात्र कधी वाटले नाही.

अशी अनेक वर्षे गेल्यानंतर या वर्षी एका वेगळ्या प्रकारच्या रक्षाबंधन सोहळ्याला हजर राहण्याचा योग आला. आमच्या घरापासून जवळच असलेल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अशे भारदस्त नाव असलेल्या संस्थेकडून आम्हाला एक आमंत्रण मिळाले. मलाही या संस्थेबद्दल आदरमिश्रित उत्सुकता होतीच, तिच्याबद्दल जेवढे कानावर आले होते ते चांगलेच होते, पण प्रत्यक्षात तिथे जाणे झाले नव्हते. त्यामुळे तिथला रक्षाबंधनाचा कार्यक्रम आकर्षित करत होता. आम्ही दोघेही लवकर स्नान वगैरे करून पावन होऊन जायला निघालो. जिन्याच्या पाय-या उतरून खाली उतरलो तेवढ्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. एरवी आम्ही पुन्हा घरी परत जाऊन गरम गरम चहा पीत बसलो असतो, पण या वेळी आमचा निर्धार पक्का होता. दोन तीन मिनिटांत एक रिक्शा मिळाली आणि आम्ही त्यांच्या आश्रमात जाऊन पोचलो.

हा आश्रम म्हणजे एक सिमेंट काँक्रीटची लहानशी पक्की इमारत आहे. तिथल्या पहिल्या मजल्यावरच्या हॉलमध्ये शंभर दीडशे खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या, त्या अर्ध्याअधिक भरल्या होत्या. स्टेजवर एका महापुरुषाची तसबीर ठेऊन त्याला पुष्पमाला घातल्या होत्या. तीन चार खुर्च्याही मांडून ठेवल्या होत्या. लाउडस्पीकरवर रक्षाबंधनासंबंधी सुमधुर आणि अर्थपूर्ण अशा गाण्यांच्या रेकॉर्ड्स वाजत होत्या. तिथली एकंदर स्वच्छता आणि टापटीप वाखाणण्यासारखी होती. तिथे आलेली सगळी माणसेही डिसेंट दिसत होती आणि गलका न करता शांतपणे बसून ती गाणी ऐकत होती. कार्यक्रमाची सुरुवात होण्याची वेळ येताच पांढरा शुभ्र गणवेष असल्यासारख्या साड्या नेसलेल्या चार महिला आल्या आणि व्यासपीठावर स्थानापन्न झाल्या. त्यांना सगळे दीदी असे म्हणत होते. सर्वांनी त्यांना आणि त्यांनी सर्वांना अभिवादनाची देवाणघेवाण करून झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रजापिता ब्रह्मकुमारी ही संस्था किंवा संप्रदाय जगातल्या किती देशांमध्ये पसरला आहे आणि त्याची किती ठिकाणी केंद्रे आहेत, त्यांचे विचार, ध्येयधोरणे वगैरेंबद्दल संक्षिप्त माहिती देण्यात आली.

त्यानंतर सर्वात ज्येष्ठ दीदींचे सुरस व्याख्यान झाले. त्यांनी अगदी सोप्या भाषेत धर्माचरण, व्यसनमुक्ती वगैरेंवर भर दिला. या दिवशी संस्थेच्या प्रमुखांच्या वतीने त्या दीदी सर्वांना म्हणजे सर्व उपस्थित स्त्रीपुरुषांना राखी बांधणार होत्या पण त्याच्या आधी सर्वांनी एक फॉर्म भरून द्यायचा होता. त्या दिवसापासून आपण अमूक एक व्यसन सोडणार आहोत असे वचन त्या फॉर्मद्वारे द्यायचे होते. माझ्यासारख्या ज्याला कसलेच व्यसन नव्हते त्यांनी एक दुर्गुण सोडायचा निर्धार करायचा होता. हे काम अधिक कठीण होते की कमी कठीण होते कोण जाणे. सर्वांनी फ़ॉर्म भरून तिथे ठेवलेल्या बॉक्समध्ये टाकला आणि रांगेने पुढे जाऊन दीदींकडून पांढरी शुभ्र राखी बांधून घेतली. निरनिराळा संदेश असलेले एक एक कार्डही त्यांनी प्रत्येकाला दिले, हा परमेश्वराने दिलेला आदेश आहे असे मानून त्याचे पालन करण्याचा यथाशक्ती प्रयत्न करावा असे त्यांनी त्यांच्या प्रवचनात आधीच सांगितले होते. सर्वांनी ते कार्ड शिरोधार्य मानले. माला मिळालेले कार्ड हा आदेश नसून एक अभिप्राय होता. तो कितपत योग्य होता हे मला ओळखणारेच सांगू शकतील. सर्वांना प्रसाद म्हणून अल्पसा फराळ वाटला गेला. तो प्रसाद भक्षण करून आणि एक वेगळा अनुभव घेऊन आम्ही घरी परतलो.        

Tuesday, August 05, 2014

बेडूक, कोकिळा, गाढव आणि उंट



या चार पशुपक्ष्यांमध्ये काही तरी समान धागा असेल का? बेडूक हा डबक्यांमधल्या चिखलात राहणारा प्राणी आहे तर उंट म्हणजे रुक्ष वाळवंटातले जहाज. रानावनातल्या झाडांच्या फांद्यांमध्ये लपून कोकिळा कुहूकुहू करत असते तर गाढवे गावातल्या उकिरड्यांवर सर्रास लोळत पडलेली दिसतात. त्यांच्यात विरोधाभास असला तरी वैर असायचेही काहीच कारण नाही. त्यासाठी ते एकमेकांच्या संपर्कात येण्याची शक्यताही कमीच असते. मग मी यांना एकत्र का आणले आहे? संस्कृत भाषेतल्या सुभाषितांचा अभ्यास करतांना मला त्यांच्यातले दुवे मिळाले. या सुभाषितांमध्ये अनेक वेळा प्राणीमात्रांचे दाखले दिले असले तरी त्यांचा उद्देश माणसांनी त्यावरून बोध घ्यावा असा असतो. या आणि इतरही सगळ्याच प्राण्यांचे काही गुण आपल्यामध्ये असतात. त्याचे परिणाम कसे होतात किंवा होऊ नयेत याविषयी या सुभाषितांमध्ये सुचवलेले असते.

बेडूक म्हंटले की लगेच लहानपणी शिकलेली कविता आठवते. "लगीन करतो बेडूकराव। डराँव डराँव डराँव डराँव।।" पावसाळा सोडून इतर ऋतूंमध्ये हे प्राणी कुठल्या खबदाडात लपून बसले असतात कोण जाणे, पण पाऊस पडून डबकी साचायला लागली की जिकडे तिकडे त्यांच्या फौजा दिसायला लागतात आणि डराँव डराँव डराँव डराँव च्या गोंगाटाने आसमंताला भरून टाकतात. वसंत ऋतूमध्ये आपल्या कूजनाने सर्वांना मोहवून टाकणा-या कोकिळाने मात्र या काळात आपली कुहूकुहू पार थांबवून टाकलेली असते. या दोन घटनांचा संदर्भ सुभाषितकारांनी असा जोडला आहे.  

भद्रम् कृतम् कृतम् मौनम् कोकिलैः जलदागमे ।
दर्दुराः यत्र गायन्ति तत्र मौनं हि शोभनम् ।।
आभाळात काळे ढग जमायला लागताच (पावसाळा येताच) कोकिळांनी मौन धारण केले हे बरेच झाले. बेडकांची डराँवडराँव सुरू झाल्यानंतर तिथे (कोकिळांनी) गप्प राहण्यातच शोभा आहे. बेसूर गायकांच्या आरडाओरडीमध्ये चांगल्या गायनातली सुरेल तान कोणाला ऐकू येणार आहे किंवा मूर्खांच्या कर्कश कलकलाटात उपदेशाचे सौम्य शब्द कोण ऐकणार आहे? त्यांनी अशा वेळी गप्प बसून राहणेच उचित ठरेल.

वरील सुभाषितात कोकिळेच्या गुणांबद्दल तिची स्तुती केलेली असली तरी तिला इतके डोक्यावर घेण्यासारखे तिने कुणासाठी काय केले आहे? आणि गाढवाचे ओरडणे मधुर नसले म्हणून त्यात त्याने काय पाप केले आहे? गाढव निदान माणसांचे भार तरी वाहतो, कोकिळ पक्ष्याचा कुणाला काय उपयोग होतो? केवळ गोड बोलणारे महत्वाचे नसतात, दुस-यासाठी काही करण्याला अधिक महत्व दिले पाहिजे, पण जगात तसे घडत नाही. सगळीकडे बोलघेवड्यांचेच कौतुक होते, तेच सगळ्यांना आवडतात, परखड शब्द बोलणारे अगदी निरुपद्रवी असले तरीसुद्धा ते कोणाला आवडत नाहीत. अशी जगरहाटी आहे असे खालील सुभाषितात सांगितले आहे.  

वाङ्माधुर्यात् सर्वलोकप्रियत्वम् । वाक्पारुष्यात् सर्वलोकाप्रियत्वम् ।
किंवा लोके कोकिलेनोपकारः । किंवा लोके गर्दभेणाप्रकारः।।
मधुर बोलणारे सर्वांनाच प्रिय होतात, कठोर वचनाने ते लोक सर्वांनाच अप्रिय होतात. कोकिळ पक्ष्याने जगावर असे कोणते उपकार केले आहेत? (तरीही तो सर्वांना आवडतो) आणि गाढवाने कुणाचे काय वाईट केले आहे? (म्हणून ते कोणालाही आवडत नाही.)

गाढवाचा आवाज जसा कोणाला आवडत नाही त्याचप्रमाणे उंटाला कोणी सुरेख म्हणत नाही. त्याचे तोंड, मान, पाठ, पाय वगैरे सगळेच अवयव इतर प्राण्यांशी तुलना करत आउट ऑफ प्रपोर्शन वाटतात. अष्टावक्र किंवा आठ जागी वाकडा अशीही उंटाची भलामण केली जाते. गाढव आणि उंट या समदुःखी प्राण्यांनी आपसात मैत्री केली. "समानशीलव्यसनेषु सख्यम्" असेही एक सुभाषित आहेच. उंटांच्या घरी साज-या होत असलेल्या लग्नसमारंभात गाढवांना भाट म्हणून पाचारण केले गेले. त्यांनी आपल्या आवाजात खूप रेकून घेतले, त्यात उंटांच्या सौंदर्याची तोंड फाटेपर्यंत तारीफ केली. उंटांनीही गर्दभउस्तादांच्या गायनाची स्तुती करून याची परतफेड केली. असे खाली दिलेल्या सुप्रसिद्ध सुभाषितात सांगितले आहे.

ऊष्ट्राणाम् च गृहे लग्नम् गर्दभाः स्तुतिपाठकाः ।
परस्परम् प्रशंसन्ति अहो रूपम् अहो ध्वनिः ।।

दोन अयोग्य व्यक्ती एकमेकांची वाहवा कशी करतात हे या उदाहरणात दिसून येते. हे ऐकणारा जाणकार असेल तर समजायचे ते समजून घेतो, पण अजाण लोक त्या स्तुतिप्रदर्शनात वाहवून जातात असेही काही वेळा दिसते. आपले असे होऊ नये, तसेच आपले हंसेही होऊ नये याची काळजी घ्यावी हे उत्तम.

Friday, July 18, 2014

जसलोक हॉस्पिटल



नोकरीच्या सुरुवातीच्या काळात माझे ऑफिस गेट वे ऑफ इंडियाजवळ होते. मी मित्रांच्यासोबत दादरला रहात होतो आणि कधी ट्रेनने तर कधी बसने ऑफिसला जात येत असे. त्यातल्या काही रूट्सच्या बसेस पेडररोडवरून जात असत. तेंव्हा महालक्ष्मीच्या कोप-यावरून पुढे जातांना पेडर रोडवर एक गगनचुंबी इमारत बांधली जात असलेली बसच्या खिडकीमधून दिसायची. मलबार हिलच्या शेजारीच असलेल्या त्या कंबाला हिलवरही श्रीमंतांची वस्ती होती. त्यांच्या भरवस्तीत कोणाला ऑफिसची इमारत बांधू दिली जाईल असे वाटत नव्हते, त्या इमारतीची रचना राहत्या घरांपेक्षा वेगळी वाटत होती, कुठल्याही कॉलेजला अशी भव्य इमारत बांधणे परवडणे कठीण होते. यामुळे ती कसली इमारत असेल यावर चर्चा होत असतांना ती एका नव्या हॉस्पिटलसाठी बांधली जात असल्याचे समजले. त्याचे नाव 'जसलोक हॉस्पिटल' असे असणार आहे ही माहितीही मिळाली.

पण 'जसलोक' या शब्दाचा काय अर्थ असेल असा नवा प्रश्न उभा राहिला. सर्व विश्वाची विभागणी स्वर्गलोक, मर्त्यलोक आणि पाताळलोक यात झाली आहे अशी पारंपरिक समजूत होती. जसलोक म्हणजे जमीनीवरला स्वर्ग की जमीनीवरून स्वर्गाकडे जाणा-या रस्त्यावरले विसाव्याचे ठाणे असे काही अर्थ अनर्थ लावून त्यावर तर्क कुतर्क केले जात होते. या हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ खुद्द पंतप्रधानांच्या हस्ते मोठ्या दिमाखात झाला. त्यावरून त्याला सरकार दरबारीसुद्धा केवढा मान मिळाला होता याची कल्पना येईल. उद्घाटनाच्या वेळी त्याला जी प्रसिद्धी मिळाली त्यात त्याच्या जसलोक या नावाची कुळकथाही जाहीर केली गेली. सेठ लोकूमल चानराय आणि त्यांच्या पत्नी जसोटीबाई चानराय यांच्या नावातली पहिली तीन तीन इंग्रजी अक्षरे घेऊन जसलोक हे नाव तयार केले गेले होते. कंबाला हिल भागात वीस मजली आलीशान इमारत बांधणे, त्यात सर्व प्रकारची अद्ययावत यंत्रसामुग्री बसवणे, रुग्णांसाठी सा-या सुखसोयी पुरवणे वगैरेंसाठी चाळीस वर्षांपूर्वीच्या त्या काळातसुद्धा कोट्यावधी रुपयांची गरज होती. आता त्याची किंमत अब्जावधींमध्ये होईल. जो माणूस इतके पैसे फक्त एका धर्मादाय कामासाठी खर्च करू शकतो त्याचे उत्पन्न आणि त्याची संपत्ती किती अफाट असेल? टाटा, बिर्ला यांच्यासारखे त्या काळातले मोठे उद्योगपती किंवा निझामासारखे नवाबच ते करू शकले असते. पण चानराय हे नाव यात कुठे बसत नव्हते. ते कोणत्या संस्थानाचे राजे नव्हते किंवा भारतातल्या उद्योगव्यवसायाच्या विश्वातदेखील प्रसिद्ध नव्हते. त्यानंतरही मी जसलोक हॉस्पिटल वगळता इतर कोणत्याच संदर्भात चानराय हे नाव कधीच ऐकले नाही. 

चानराय कुटुंब मूळचे सिंधमधले होते, पण भारताची फाळणी होण्याच्या आधीच त्यांनी सिंगापूर, हाँगकाँग वगैरे ठिकाणी चांगला जम बसवला होता आणि आशियातच नव्हे तर आफ्रिका, अमेरिका, युरोप आदि खंडांमध्ये अनेक ठिकाणी त्यांचे उद्योग होते आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात ते उलाढाल करत होते म्हणे. परदेशांमध्ये राहणा-या भारतीयांच्या आणि त्यांच्या भारतातल्या नातेवाइकांच्या सोयीसाठी युरोपअमेरिकेतल्यासारखे एक अत्याधुनिक हॉस्पिटल मुंबईत उभारायचे आणि चालवायचे असे त्यांनी मनावर घेतले. त्या काळातल्या आघाडीवर असलेल्या डॉक्टरांनी केलेल्या सहाय्यामधून त्यांचे हे स्वप्न साकार झाले. हे हॉस्पिटल पूर्णपणे खाजगी असल्यामुळे ते व्यापारी तत्वावर चालवले जाणार आणि सामान्य माणसांच्या खिशाला परवडणार नव्हते हे ओघाने आलेच

जसलोक हॉस्पिटल सुरू होईपर्यंतच्या काळात मी दादर सोडून चेंबूरला रहायला गेलो होतो त्यामुळे माझा ऑफिसला जाण्याचा रस्ता बदलला होता. मला पेडर रोडच्या वाटेने जाण्याचे काही कारण उरले नसल्यामुळे जसलोक हॉस्पिटल नजरेआड गेले होते. त्याबद्दलच्या बातम्या मात्र नेहमी वाचण्यात येत असत. "अमका अमका नेता, सिनेकलावंत किंवा उद्योगपती असा एकादा प्रसिद्ध माणूस तिथे अॅडमिट झाला आहे", "अमके अमके अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीचे ऑपरेशन भारतात प्रथमच तिथे करण्यात आले," किंवा "अमक्या अमक्या विशिष्ट प्रकारच्या तपासण्यांची व्यवस्था तिथे केली गेली आहे." असे काही ना काही अधून मधून छापून येत असे. पण त्या काळात त्यातल्या कशातच आम्हाला इंटरेस्ट नसल्याने आपला या इस्पितळाशी कधीच संबंध येणार नाही हेच त्यावरून ध्वनित होत असे. माझ्या आसपास वावरणा-या लोकांच्या वर्तुळात होत असलेल्या चर्चांमध्ये जसलोक हॉस्पिटलचा उल्लेख कधीही येत नसे.

काही वर्षांनी माझे ऑफिस वॉर्डन रोडवरील आनंदभवनमध्ये शिफ्ट झाले. तिकडे जाणारी आमची बस पेडर रोड मार्गाने जात असल्याने आम्ही जसलोकच्या आधीच्या कोप-यावर उतरून चालत ऑफिसला जात असू. यामुळे पुन्हा एकदा जसलोक हॉस्पिटल आमच्या रोजच्या पाहण्यात आले. तिथे जाणारे बहुतेक सगळे लोक कारमधून किंवा टॅक्सीमधून येत असत किंवा जास्तच आजारी रुग्ण अँब्युलन्समधून आणले जात असत. त्या हॉस्पिटलमध्ये चालत चालत जाणारे कोणीही सहसा दिसत नसत. एकदा आत जाऊन निदान पाहून तरी येण्याची उत्सुकता सर्वांना असायची, पण त्यासाठी कोणतेही कारण किंवा निमित्य मिळत नव्हते.   

आम्ही दोघे तीघे मित्र एकदा जसलोक हॉस्पिटलच्या गेटपर्यंत जाऊनही आलो. त्या इमारतीच्या मुख्य दरवाजातच कडक इस्त्रीच्या गणवेशातले दोन धष्टपुष्ट तगडे पहारेकरी उभे होते आणि आत येणा-यांची चौकशी करून त्यांना आत सोडत होते. आमच्याकडे त्यांना सांगता येण्यासारखे काही कारण नव्हते आणि यापूर्वी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जाण्याचे प्रसंगच आमच्यावर फारसे आलेले नसल्यामुळे अशा वेळी कोणते कारण सांगता येते हेसुद्धा त्या वेळी आम्हाला माहीत नव्हते. आमच्यासारख्या बाहेरून तरी संपूर्ण निरोगी दिसणा-या तरुणांना त्या दरवानांनी नक्कीच आत सोडले नसते. आमच्याच ऑफिसात प्रवेश करू इच्छिणा-या आगांतुक लोकांना आमचे सिक्यूरिटी गार्ड्स कसे हिडीस फिडीस करतात हे आम्ही पहात असल्यामुळे आम्हाला आमची शोभा करून घ्यायची नव्हती. उगाच हात दाखवून अवलक्षण करून घेण्यापेक्षा आल्या पावली परत जायचे आम्ही ठरवले. काही काळानंतर माझे ऑफीस पुन्हा कुलाब्याला गेले आणि जसलोक हॉस्पिटल माझ्या नजरेआड झाले.

त्यानंतरच्या काळातही जसलोक हॉस्पिटलचे नाव वर्तमानपत्रात आणि टेलिव्हिजनवर येतच राहिले. मलाही पदोन्नती मिळत गेल्या आणि पंचतारांकित संस्कृतीचा विस्तार होत तिने मला गाठलेच. सेमिनार्स, वर्कशॉप्स, मीटिंग्ज वगैरेंसाठी मीही ताज, ओेबेरॉय, सेंटॉर वगैरेसारख्या मोठ्या हॉटेलांमध्ये अधून मधून जाऊ लागलो. कधी तिथल्या द्वारपालांच्या नजरेला नजर भिडवून तर कधी त्यांच्याकडे न पाहिल्यासारखे करून सराईतपणे टॉक टॉक करत बेधडक आत शिरण्यात मीही तरबेज झालो. त्या काळात दहशतवाद फोफावला नसल्यामुळे अंगझडती वगैरे घेतली जात नसे आणि त्यासाठी थांबायची आवश्यकता नसायची. त्यामुळे जसलोक हॉस्पिटलच्या दरवानांची भीती उरली नव्हती, पण केवळ उत्सुकतेपोटी मुद्दाम वाकडी वाट धरून हॉस्पिटल पहायला जाण्याएवढी हौसही वाटत नव्हती. ते राहूनच गेले.

वयोमानानुसार नवनवीन दुखण्यांची चाहूल लागल्यामुळे अनेक प्रकारच्या तपासण्या करून घ्याव्या लागत होत्या. अशाच काही कारणासाठी अलकाला थॅलियम टेस्ट करून घ्यायला सांगितले गेले. आमच्या हॉस्पिटलमध्ये त्या टेस्टची सोय नसल्यामुळे त्यासाठी जसलोक हॉस्पिटलला जायला सांगितले गेले. या चाचणीमधून काय निष्पन्न होणार असेल? आणि त्यातून एकाद्या गंभीर आजाराचे निदान तर होणार नाही ना? अशी धुकधुक मनात वाटत होतीच, पण कित्येक वर्षांपासून मनाच्या एका कोप-यात दडलेली उत्सुकताही तिचे डोके वर काढत होती. जसलोक हॉस्पिटलचे पत्र घेऊन आम्ही तिथे जाऊन पोचलो. थॅलियम टेस्ट एवढे दोन शब्द उच्चारणे आत शिरण्यासाठी पुरेसे होते.

दरवाजातून आत शिरताच आम्ही एका प्रशस्त हॉलमध्ये प्रवेश केला. त्याच्या मधोमध स्वागतिकांचे (रिसेप्शनिस्ट्चे) काउंटर होते. काउंटरवरील महिलेला आम्ही हातातले कागद दाखवले. आम्ही प्रथमच त्या ठिकाणी आलेले आहोत हे तिने आमच्या देहबोलीवरूनच नक्की ओळखले असणार आणि कदाचित "लगता है, पहली बार आये हुवे है।" असे ती तिच्या मैत्रिणीच्या कानात कुजुजलीही असेल असे मला वाटले. "पहली बार हैं, मगर आखरी बार नही।" असे तो-यात म्हणायला ते काही महागडे रेस्टॉरेंट नव्हते आणि पुन्हा हॉस्पिटलमध्ये यायची आम्हालाही काही हौस नव्हती. "जसलोक हॉस्पिटलला आमची ही पहिली भेट आहे का?" हा प्रश्न रिसेप्शनिस्टने मला सरळ न विचारता आम्हाला आमचा रजिस्ट्रेशन नंबर विचारला. आमच्याकडे तो नव्हताच. त्यावर तिने हॉलच्या उजव्या बाजूला असलेल्या अनेक कौंटर्सकडे बोटे दाखवत "इथून एक फॉर्म घ्या, तो भरून तिथे द्या, तिच्याकडून व्हाउचर घेऊन कॅशरकडे जा, त्यांनी व्हाउचरवर शिक्का मारल्यानंतर ते अमूक नंबरच्या खिडकीत द्या, तिथला माणूस तुम्हाला कुठे जायचे ते सांगेल." वगैरे मार्गदर्शन केले.  ते पूर्ण केल्यानंतर आम्हाला थॅलियम टेस्ट जिथे करायची होती तिकडे पाठवण्यात आले. मोठ्या हॉस्पिटलमध्ये जातांना ही सगळी धावपळ करणयासाठी रुग्णाच्या सोबतीला एक धडधाकट माणूस असणे किती आवश्यक असते हे कळून चुकले.

हॉस्पिटलच्या मुख्य इमारतीतल्या निरनिराळ्या विभागांकडे जाण्याच्या वाटेवर आणखी दोन पहारेकरी उभे होते. ते मात्र कागदपत्रे किंवा ओळखपत्र पाहिल्याशिवाय कोणालाही आत जाऊ देत नव्हते. बाहेरच्या रखवालदारांवर रुबाब दाखवून किंवा त्याला चकवून कोणी आत आला तरी त्याला मुख्य इमारतीत प्रवेश करता येऊ नये यासाठी ही योजना होती. या वीस मजली इमारतीमधील काही मजल्यांवर तपासण्या होतात, काही मजल्यांवर शस्त्रक्रिया होतात, एकाद्या मजल्यावर ऑफिसे आहेत आणि इतर मजल्यावर रुग्णांना ठेवले जाते. त्यातही निरनिराळ्या प्रकारचे रुग्ण वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये असतात अशी माहिती मिळाली. आम्हाला थॅलियम टेस्टसाठी विशिष्ट खोलीमध्ये जायला सांगण्यात आले. त्यासाठी पाचसहा तरी लिफ्ट होत्या, पण त्यातल्या काही लिफ्ट्स कर्मचा-यांसाठी, काही रुग्णांसाठी आणि काही व्हिजिटर्ससाठी राखून ठेवल्या होत्या. या सगळ्या लिफ्ट्स सर्व मजल्यांवर थांबत नाहीत, विशिष्ट मजल्यावरच थांबतात. त्यामुळे आम्हाला हव्या असलेल्या मजल्यावर जाण्यासाठी आम्ही कोणती लिफ्ट घ्यायची हे शोधून काढले आणि तिथे जाऊन पोचलो. टेस्टचा रिपोर्ट घेऊन जाण्यासाठी वेगळी खेप घालावी लागली. पण सगळे काही अलबेल आहे हे समजल्यावर उसासा टाकला.

त्यानंतर वयोमानानुसार व्याधी आणि त्या अनुषंगाने करायच्या तपासण्या वाढत गेल्या आणि त्यासाठी जसलोक हॉस्पिटलमध्ये अनेक वेळा जावे लागले. काही वेळा तिथे रहावेही लागले. तिथल्या कोणत्या मजल्यावर काय चालते इथपासून ते तिथल्या कँटीनमध्ये कोणकोणते पदार्थ मिळतात आणि त्यातले कुठले चविष्ट किंवा चांगले असतात इथपर्यंत बरेच सामान्यज्ञान प्राप्त झाले. मला सुरुवातीला वाटत होते तसे हे हॉस्पिटल फक्त अतीश्रीमंत लोकांचे नव्हते. तिथे येणा-या लोकांमध्ये अनेक मध्यमवर्गीय दिसत होते. आजकाल अनेक कंपन्या कर्मचा-यांचा आरोग्यविमा काढतात. कदाचित त्यामुळे ते लोक इथे येत असतील. या हॉस्पिटलमध्ये काही परदेशी, विशेषतः अरब आणि आफ्रिकन लोक नेहमी दिसतात. उपचारासाठी इंग्लंड अमेरिकेत जाण्यापेक्षा जसलोक हॉस्पिटलमध्ये येणे त्यांच्या दृष्टीने बहुधा कमी खर्चाचे आणि अधिक सोयिस्कर असावे.

जसलोक हॉस्पिटलमध्ये कोणी अॅडमिट झाला असला तर एका व्यक्तीला त्याच्या सोबत राहण्यासाठी परवानगी असते. त्या सोबत्याला बसण्यासाठी किंवा झोपण्यासाठी रेल्वेतल्या स्लीपरएवढी एक लहानशी गादीसुद्धा असते. जेवणखाण्यासाठी मात्र त्याला कँटीनमध्येच जावे लागते. रुग्णाला भेटायला जाण्यासाठी ठराविक वेळ असते. त्यासाठी एक पास दिला जातो, तो घेऊन त्या वेळेतसुद्धा एका वेळी एकचजण आत जाऊ शकतो. आत जातांना त्या पासची पहाणी होते. लहान मुलांना सोबत घेऊन जाता येत नाही. अतीदक्षताविभागात ठेवलेल्या रुग्णाच्यासोबत एका व्यक्तीने चोवीस तास तिथे राहणे आवश्यक असते, पण ती व्यक्ती त्या दालनात थांबू शकत नाही. तिने बाहेरच्या कॉरी़डॉरमध्ये बसायचे असते. या सोबतींसाठी वीसाव्या मजल्यावर डॉर्मिटरी आहे. रात्री त्यांनी तिथे जाऊन झोपायचे असते. सर्वांकडे मोबाईल फोन असावे लागतात आणि आजकाल असतातच. गरज पडतांच त्यांना बोलावून घेतले जावे यासाठी व्यवस्था असते. सगळ्या मजल्यांवर वायफायची सुविधा आहे. त्यासाठी पासवर्ड घेऊन तो वापरता येतो. त्यामुळे अनेक लोक तिथे बसल्यबसल्या लॅपटॉपवर काम करतांना दिसतात. काळाबरोबर आवश्यक त्या सुधारणा आणि सोयी या ठिकाणी केल्या गेल्या आहेत.

जसलोक हॉस्पिटलशी माझा कसकसा संबंध येत गेला आणि त्याबद्दलचे माझे अनुभव अधिक खोलात न जाता देण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.      

Monday, June 23, 2014

माझा दर महिन्याचा खर्च किती?

"महिन्याला साधारण किती खर्च येतो?" असा एक अवांतर प्रश्न माझ्या आधीच्या एका लेखावर विचारला गेला होता. त्यावर निरनिराळी आकडेवारी देणा-या उत्तरांचा पाऊस पडला. "या गोष्टीसाठी तुमच्याकडे इतके पैसे पडतात? अबबबबब .. " किंवा "बैबैबैबै आता इतके तरी खर्च करायला नकोत का?", "होहोहो" किंवा "नैनैनै" वगैरे सारखे प्रतिसाद होतेच, शिवाय ठाण्यात किंवा पुण्यात, त्यातसुद्धा नौपाड्यात की कासारवडवलीला, नारायण पेठेत की पिंपळे सौदागरला असे भेदसुद्धा होते. दिल्लीचं तर सगळच अचाट असे इकडच्या लोकांना वाटले. मूळ लेखाच्या झुडपापेक्षा हे बांडगूळ बरेच मोठे होणार याचा अंदाज आल्याने ते कलम उपटून "सध्या मासिक खर्च किती आहे?" या नावाने दुसरीकडे लावले गेले आणि पाहता पाहता ताडमाड वाढले.

एवढेच नव्हे तर दर महिन्याला अमूक इतका खर्च होतो असे गृहीत धरले आणि इतके मोठे डबोले घेऊन आज कोणी धनिक बाहेरून भारतात किंवा महाराष्ट्रात आला तर तो माणूस यापुढे पैसे कमावण्यायाठी काहीही काम न करता अनंत कालपर्यंत (खरे तर त्याच्या अंतकालापर्यंत) आरामात राहू शकतो का? या विषयावर दुसरा धागा निघाला आणि तोही चांगला फुलला. यात भविष्याचा वेध घ्यायचा असल्यामुळे कल्पकतेला जास्तच वाव होता. काही लोकांनी एक्सेललशीटवरील आकड्यांची मोठमोठी भेंडोळी सादर केली. या चर्चेत एका विद्वानाने अशा प्रकारचे प्रतिपादन केले की (पैसे आहेत तोवर) रोज केक आणून खा आणि तो (कदाचित त्याचा रिकामा खोका) कपाटातही ठेवा म्हणजे पुढे खाता येईल. (यू कान्ट ईट अ केक अँड हॅव इट टू). अशी एक इंग्रजी म्हण).अशी एक इंग्रजी म्हण) ही चलाखी एका चाणाक्ष वाचकाच्या लक्षात आल्यावर पुन्हा हिशोब केला तेंव्हा अनंतकाल पुरणारे पैसे काही वर्षात संपून जातांना दिसले. माझ्याकडे जेंव्हा नव्याने पीसी आला होता, त्यावेळी मी अशा प्रकारची असंख्य कोष्टके तयार केली होती. त्या काळात माझा जो काही मासिक पगार होता त्यात दरवर्षी ५, १०, १५, २० टक्के वाढ धरली, त्यातून दरमहा ५, १०, १५, २०, २५ टक्के बचत केली, त्या बचतीमधून केलेल्या इन्व्हेस्टमेंटवर दरवर्षी १०, १५, २०, २५  टक्के परतावा मिळाला, ते पैसे पुन्हा गुंतवले तर मी कधीपर्यंत लक्षाधीश, कोट्याधीश, अब्जाधीश वगैरे होईन ते पाहिले होते आणि मनातल्या मनात मांडे खाल्ले होते. पुढल्या काळात मीच काय, माझ्या ऑफिसातले सगळे प्यून आणि ड्रायव्हरदेखील लक्षाधीश झाले. मात्र फार थोडे लोक कोटीपर्यंत पोचले. पुढच्या पिढीतल्या ज्या मुलांनी मुंबईपुण्यात बांधल्या जात असलेल्या जंगी इमारतींमध्ये मोठाले फ्लॅट्स बुक करून ठेवले आहेत किंवा ताब्यात घेतले आहेत ते बहुधा आताच कोट्याधीश झाले असणार. पण तसे वागणे मात्र त्यांच्यासाठी जरा कठीण वाटते. कारण पुढच्या महिन्यातला ईएमआय कसा भरायचा याची काही लोकांना विवंचना असते आणि अमेरिकेत झाले तसे इकडे झाले आणि प्रॉपर्टीजच्या किंमती धडाधड कोसळायला लागल्या तर काय होणार? याची टांगती तलवार डोक्यावर लोंबकळत असते.

ऐसी अक्षरेवरले हे दोन्ही लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचतांना मला खूप गंमत वाटत होती. "महिन्याला साधारण किती खर्च येतो?" या प्रश्नाचे ठाम उत्तर इतक्या सगळ्या लोकांना माहीत होते, मग माझे मलाच ते का सापडत नव्हते? तसा मी गणितात फार कच्चा नाही. पूर्वीच्या काळातल्या एसएससी बोर्डाच्या परिक्षेत मला अंकगणितात १०० पैकी १०० गुण मिळाले होते. "यात काय आहे? ते तर आजकाल कोणालाही मिळतात!" असे कोणी ना कोणी म्हणणार म्हणून 'पूर्वीच्या' काळाचा उल्लेख! त्यामुळे निदान बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार वगैरे मला अजूनही येत असतील असे समजायला हरकत नसावी. पण मुळात माझ्याकडे खर्चाचे विश्वसनीय असे आकडेच नसतील तर कशाची बेरीज आणि कशाचा गुणाकार करणार?

पन्नास वर्षांपूर्वी मी कॉलेज शिकायला शहरात गेलो तेंव्हा मला पै न पैचा (खरे तर नव्या पैशांचा) हिशोब लिहून द्यावा लागायचा. त्यामुळे मेसबिल सारख्या मुख्य आकड्यापासून केशकर्तनालयात द्यायच्या रकमेपर्यंत आणि कागद, पोन्सिल, वह्या, पुस्तकांपासून ते सुई दोरा आणि टांचण्यांपर्यंत सगळे खर्च मी एका कच्च्या वहीत लिहून ठेवत असे आणि महिना संपताच ते 'फेअर' करून आणि त्यात (अत्यावश्यक) फेरफार करून घरी पाठवून देत असे. पण या सगळ्याचा मला इतका उबग आला की मी स्वतः पैसे मिळवायला लागल्यानंतर कधीही त्यांचा हिशोब ठेवला नाही तो नाहीच! 

तसे पाहता माझ्या हातात रोख पैसेही क्वचितच मिळाले. लहानपणी आमच्या शेजारीपाजारी किंवा कोणा नातलगाच्या घरी कसलीशी पूजा असली किंवा त्यातल्या एकाद्या काकूच्या एकाद्या व्रताचे उद्यापन असले तर ते लोक  ओळखीतल्या दोन चार मुलांना जेवायला बोलावत असत. त्या जेवणातल्या पक्वान्नांवर आडवा हात मारून घेतांना मजा यायची, पण पानातल्या डाव्याउजव्या बाजूचे सगळे पदार्थ आवडत नसले तरी ते निमुटपणे गिळावे लागायचे. ते सगळे संपवल्यावर पाटावरून उठायच्या आधी दक्षिणा म्हणून एक भोकाचा पैसा हातावर ठेवला जात असे आणि घेतलेल्या कष्टाची थोडी भरपाई होत असे. यजमान जरा उदार असला तर त्याच्या दुप्पट किंमतीचा ढब्बू पैसा मिळायचा. ताट, पाट, रांगोळीवाल्या तसल्या पंगतीच आता दुर्मिळ झाल्या आहेत. दहा बारा वर्षांपूर्वी कुणाकडे तरी जेवण झाल्यानंतर हातात एक बंदा रुपया पडला होता ती मला मिळालेली शेवटची दक्षिणा. मित्रांच्या कोंडाळ्यात किंवा पिकनिकला गेलो असतांना कधी एक पैसा पॉइंट अशा 'डॅम चीप' स्टेकवर रमी खेळतांना नशीबाने दोन चार जोकर आले आणि प्यूअर सिक्वेन्सही लागला तर पंचवीस तीस रुपयांची रोख कमाई व्हायची, एकाद्या मेळाव्यात हाउसी तंबोला खेळतांना 'अर्ली फाय' किंवा 'लास्ट रो'चे बक्षिस विभागून मिळायचे. असे काही क्षुल्लक अपवाद सोडले तर माझ्या कमाईचे रोख पैसे हातात पडल्याचे फारसे आठवत नाही.  

मी नोकरीला लागल्यापासून मला चेकने पगार मिळाला आणि नंतर तर तो थेट बँकेतल्या खात्यावर जमा व्हायला लागला. व्याज, डिव्हिडंड, कन्सल्टन्सी फी, ऑनरेरियम वगैरे मार्गांनी झालेली इतर आयसुद्धा चेकने मिळत गेली किंवा परस्पर बँकेत जमा होत आली. इतकेच काय पण जी काही 'उत्तेजनार्थ' वगैरे बक्षिसे मिळाली ती सुद्धा भेटवस्तूंच्या रूपात किंवा चेकनेच! दर वर्षी आयकराचे विवरण (इन्कमटॅक्स रिटर्न) भरणे सक्तीचे झाल्यापासून मिळालेल्या उत्पन्नाचा वार्षिक हिशोब ठेवणे गरजेचे होते, नाइलाजाने बँकेची पासबुके पाहून तेवढे काम करावेच लागत होते. पण खर्चाचा हिशोब ठेवण्याची सक्ती नव्हती. त्यामुळे तो ठेवण्याची गरजही नव्हती. त्या काळात ई बँकिंग नव्हते तरी अनेक ठिकाणी चेकने पैसे दिले जात असत. त्यातले काही एक रकमी, तर काही हप्त्याहप्यांनी दिले जात. शिवाय खिशातल्या पाकिटातले किंवा कपाटाच्या खणातले किती पैसे कधी होममिनिस्टरच्या पर्समध्ये जातील आणि त्यांचे तिथून कोणत्या दिशेने बहिर्गमन होईल ते समजणे शक्य नव्हते. त्याबद्दल विचारण्याएवढे धारिष्ट्य मला मिळू दे अशी देवाला प्रार्थना करून काही उपयोग नव्हता. कारण माझ्यासमोरच अनेक देवळांच्या पेटीत किंवा पुढ्यात तिने पैसे ठेवलेले असल्यामुळे ते सगळे देव तिच्याच बाजूने झालेले असणार हे उघड होते. एकंदरीत काय? नेहमीच्या सर्वसामान्य खर्चाचा हिशोब ठेवण्याचा विचार मी कधीच मनात आणला नाही.

पंचवीस तीस वर्षांपूर्वी एकदा माझ्या इन्कमटॅक्स रिटर्नची कसून तपासणी झाली होती. त्या वेळी मला इन्कमटॅक्स ऑफिसरकडे जाऊन त्याला पासबुके वगैरे दाखवावी लागली. त्या गृहस्थाने सुद्धा "तुमचा महिन्याचा खर्च किती?" हा प्रश्न विचारला आणि मी उत्तरादाखल खांदे उडवून दाखवले. त्या काळात माझा मूळ पगार (बेसिक पे) दोन अडीच हजार रुपये असेल आणि महागाई भत्ता, शहर भत्ता वगैरे मिळून त्यावर आणखी सात आठशे रुपडे मिळत असतील. त्यातून सगळ्या प्रकारच्या छाटण्या होऊन दरमहा सुमारे दीड हजार रुपये बँकेत जात होते. त्यातले कधी बाराशेहे, कधी तेराशेहे तर कधी चौदाशेहे रुपये मी काढून घेत होतो आणि उरलेले शिल्लक पडत होते. त्या माणसाने हे आकडे पाहिले आणि माझ्यावर एक जळजळीत दृष्टीक्षेप टाकला. बाहेरच्या कोणा नवख्या माणसाला (किंवा कदाचित बाईंना) भेटायला जायचे म्हणून मी त्या दिवशी जरा बरे दिसणारे कपडे घालण्याची चूक केली होती. त्या काळातल्या सुखवस्तूपणाची निशाणी माझ्या पोटाच्या आकारावरून दिसत होती, चेहे-यावरही थोडा तुकतुकितपणा होता. हे सगळे त्याने एका नजरेत टिपून घेतले आणि तो उद्गारला, "तुमच्यासारखा माणूस आणि या मुंबईमध्ये हजार बाराशे रुपयात महिना काढू शकतो हे शक्यच नाही. तुमचे आणखी कसकसले उत्पन्न आहे ते ब-या बोलाने सांगा." 

मी माझे पगारपत्रक (पे स्लिप) काढून त्याच्यासमोर धरले आणि म्हंटले, "यातली उजवी बाजू वाचून पहा. मी ऑफिसने दिलेल्या घरात राहतो, त्याचे फक्त दोन अडीचशे रुपये भाडे कापले जाते. घरून ऑफिसला आणि परत घरी यायला ऑफिसचीच बस आहे, त्याबद्दल फक्त पन्नास रुपये घेतात, औषधोपचारासाठी आमची वैद्यकीय सेवा आहे, तिची वर्गणी महिन्याला तीस रुपये, मुलीचे शिक्षण फुकट, मुलाच्या शिक्षणासाठी आमच्या वसाहतीतल्या सेंट्रल स्कूलला वर्षातून एकदा चार पाचशे रुपये फी द्यावी लागते. मी जर बाहेर कुठे नोकरी करत असलो तर याच घराचे (त्या काळातसुद्धा) पाचसहा हजार रुपये भाडे पडले असते, ट्रेनचा पास, बस, टॅक्सी रिक्शा वगैरेंवर हजार बाराशे रुपये तरी खर्च आला असता, डॉक्टरची फी आणि औषधांची किंमत मिळून दीड दोन हजार रुपये खर्च झाले असते, शाळा आणि शाळेची बस यावर दोन मुलांसाठी मिळून दर महिना तीन चार हजार रुपये खर्च झाला असता. हे सगळे आकडे जोडले तर माझा पगार निदान बारा तेरा हजार रुपये तरी होईल. माझ्यासारख्यासाठी तेवढे पुरेसे असतील नाही का? शिवाय माझे हे सगळे खर्च आणि वीज, पाणी, सफाई, टेलिफोन वगैरे सगळ्यांची बिले माझ्या पगारातूनच कापली जातात. इन्कमटॅक्स, प्रॉव्हिडंट फंड आणि कसकसल्या वर्गण्याही कापून घेतल्या जातात. दर महिन्याला जे काही बारातेराशे रुपये मी बँकेतून काढतो ते फक्त खाणेपिणे, कपडेलत्ते, साबण, शँपू असल्या खर्चासाठी लागतात. मी दारूही पीत नाही किंवा महागड्या हॉटेलात जाऊन कोंबडीही खात नाही. कधी चेंज म्हणून आम्ही हॉटेलात गेलोच तरी इडली, डोसा किंवा बटाटा वडा नाहीतर मिसळ खाऊन येतो. एरवी घरची दालरोटी खाऊन राहण्यासाठी एवढे पैसे बख्खळ आहेत नाही का?" बिचारा निरुत्तर झाला. चुकीच्या बक-याला पकडून त्याच्यावर उगाच वेळ वाया घालवल्याचा कदाचित त्याला पश्चात्तापही झाला असेल. या ठिकाणी हे सांगण्याचा उद्देश एवढाच की त्या वेळी सुद्धा माझा महिन्याचा खर्च किती होता असे म्हणायचे? रोख खर्च होणारे हजार बाराशे, की पगारातून कापलेले पैसे धरून दीड दोन हजार की मार्केट व्हॅल्यूप्रमाणे बारा तेरा हजार?

त्याच सुमाराला मला कोणीतरी सांगितले, "बघा, त्या सुशीचा दीर आताच रिलायन्समध्ये लागला आहे. तुमच्याच वयाचा असेल, पण त्याला चांगला पंधरा हजार पगार आहे, आणि तुम्ही (दोन अडीच हजारात)?" मी शांतपणे म्हंटले, "असेल, पण मी छान वसाहतीतल्या उत्तम प्रकारच्या घरात राहतो, माझी मुले चांगल्या शाळेला चालत जातात, त्यांची काही काळजी नाही. आम्हाला गरज पडताच चांगल्यापैकी वैद्यकीय उपचार मिळतात, शिवाय माझे काम मला मनापासून आवडते, माझे सहकारी माझ्याशी फार चांगले वागतात. त्या सुशीच्या दिराकडे यातले काय काय आहे? आणि त्याला किती श्रम करावे लागतात तेही त्याला विचारा." माणसाचे उत्पन्न नेमके कशात मोजायचे असते आणि त्यातल्या प्रत्येकाचे पैशात मूल्य करता येते का?

आजकालसुद्धा जसे मला सर्व श्रोतांपासून मिळणारे पैसे परस्पर बँकेत येतात तसेच माझी बरीचशी देणी चेक पेमेंट, डेबिट वा क्रेडिट कार्डे, इंटरनेट बँकिंग वगैरेंमधून परस्पर बँकेतून भागवली जातात. दर महिन्याला घरातल्या उपयोगाच्या सामानाची यादी बनवायची आणि आणलेले सामान महिनाअखेरपर्यंत संपवायचे किंवा पुरवायचे असे आम्ही अलीकडे करत नाही. पूर्वी ग्राहकसंघाचे सभासद असतांना ते लोकच एक मोठी यादी पाठवत असत आणि त्यात आकडे घालून त्या यादीसोबत आम्ही एक कोरा चेक देत असू. जो सभासद त्या महिन्याचा हिशोब करत असे तोच त्यावर रकमेचा आकडा घालून तो चेक पुढे पाठवत असे. त्यानंतर कित्येक दिवसांनी सामान घरी यायचे. त्यामुळे 'इतके पैसे मोजून इतके सामान आणले' असा फील त्या काळातही कधीच आला नाही. आजकाल घरातल्या एकेका डब्यातले सामान संपायला येते तेंव्हा ते आणले जाते किंवा एकाद्या दुकानात गेलो असतांना तिथे ठेवलेले कोणतेही सामान जरा चांगले किंवा स्वस्त दिसते आहे असे वाटले की त्याची खरेदी होते. त्या विकत घेण्याचा महिन्यांशी सहसा थेट संबंध नसतो. यातल्या कोणत्याच खरेदीत एका वेळी खूप घसघशीत रक्कम खिशातून जात नसल्यामुळे ती किती गेली ते जाणवतही नाही.

आजकाल लक्षात येण्यासारखा मोठा खर्च असतो तो वैद्यकीय कारणासाठीचा. काही स्पेशॅलिस्ट डॉक्टर लोक एका वेळा हजार, दोन हजार, तीन हजार अशी जबरदस्त फी घेतातच, त्यांनी सांगितलेल्या सगळ्या टेस्ट करून घेण्यात आणखी दोन तीन हजार रुपये जातात, काही तपासण्यांसाठी तर चार पाच हजारांवर खर्च येतो आणि हॉस्पिटलायझेशन करावे लागले तर मग विचारायलाच नको. शिवाय डॉक्टरकडे आणि लॅबमध्ये टॅक्सीने जाण्यायेण्यात हजार रुपये खर्च होतात आणि त्यात दिवसभर जाणार असला तर खाणेही बाहेरच होते त्यासाठी पैसे मोजले जातात. त्यामुळे जेंव्हा हे करण्याची गरज पडते त्या महिन्यात एकदम मोठा फटका बसतो, राहत्या घराचे भाडे द्यावे लागत नसले तरी सोसायटी चार्जेस, प्रॉपर्टी टॅक्स वगैरे द्यावे लागतात. ते तीन महिन्यातून किंवा वर्षातून एकदाच दिले जातात. शिवाय बिल्डिंगचे वॉटरप्रूफिंग, रंगकाम वगैरे करायचे असल्यास त्यासाठी बरीच मोठी रक्कम पाच सहा वर्षातून एका वर्षी पण अनेक हप्त्यांमध्ये द्यायची असते. आपल्या घराचे अंतर्गत रिपेअर किंवा रंगकाम करायचे झाल्यास त्याचाही जवळ जवळ तितकाच खर्च येतो. या सगळ्यांची बेरीज करून दरमहिन्याला त्यावर किती खर्च आला ते ठरवण्यासाठी बरेच प्रयास पडतील. ते कुणी करायचे आणि कशासाठी?  त्यानंतरचा टेलिव्हिजन, टेलिफोन्स, टेलिफोन, इंटरनेट वगैरे टेलिकम्यूनिकेशन्सवर होणारा मोठा खर्च हा बराचसा नियमित असतो पण बँकेकडून परस्पर जात असतो. त्यामुळे तो जाणवत नसतो पण त्याचा अंदाज करता येईल. थोडक्यात सांगायचे तर ज्या खर्चांचा अंदाज करता येतो ते झाल्याचे तीव्रतेने जाणवत नाही आणि जे खर्च खुपतात ते अनियमित असतात.


एक ओव्हरऑल विचार केला तर खिशात पैसे नाहीत म्हणून उपाशी रहायची वेळ कधीच आली नाही आणि खूप पैसे खुळखुळतात म्हणून कधी पानावर तुपाची धारही धरली नाही. चार्वाकमहर्षींचा उपदेश ऐकून त्यासाठी ऋण तर कधीच काढले नाही आणि पिळदार मिशाच कधी न ठेवल्यामुळे त्यांना तूप लावायचा प्रश्नच उद्भवला नाही. मग दर महिन्यात किती पैसे आले, किती गेले आणि किती राहिले याचा हिशोब ठेवला काय आणि न ठेवला काय, काय फरक पडतोय्?