Friday, November 14, 2014

स्मृती ठेवुनी जाती १२ - नाना बिवलकर

आम्ही अणुशक्तीनगरातल्या सरकारी वसाहतीत रहायला गेलो तेंव्हा आमच्या इमारतीतले साठपैकी साठ रहिवासी सायंटिस्ट किंवा इंजिनियर होते. इतकेच नव्हे तर आजूबाजूच्या तीन चार बिल्डिंगमध्येसुद्धा तीच परिस्थिती होती. आमच्यासाठी हा नवा अनुभव होता. लहान गावातल्या संमिश्र वस्तीत सोनार, शिंपी, गवंडी, गवळी, डॉक्टर, वकील, पुजारी, भटजी वगैरे सगळ्या प्रकारचे लोक रहात असायचे आणि ते कुठे राहतात हे सगळ्या गावाला ठाऊक असायचे. ज्या माणसाकडे आपले काही काम असेल तो माणूस तिथे सहजपणे भेटत असे. पण इथे कोणाचाच पत्ता कोणालाही माहीत नव्हता. आमच्या नव्या घरासाठी सामान आणून आणि लावून झाल्यानंतर मुंबईतल्या नातेवाइकांना काही निमित्याने बोलावून आमचे घर दाखवायचे होते. त्यासाठी आणि नव्या घरात रहायची सुरुवात मंगलमय वातावरणात व्हावी म्हणून एक सत्यनारायणाची पूजा करावी असा विचार आमच्या मनात आला. पण त्यासाठी कोणकोणते सामान लागते, ते कुठे मिळते आणि ती पूजा कोण सांगणार वगैरे समजत नव्हते. आमच्या हिंदी भाषिक शेजा-यांनी एका देवळातल्या गुजराथी पूजा-याला बोलावून पूजा, होमहवन वगैरे करवून घेतले, पण ते काही आम्हाला पसंत पडले नाही. अशाच दुस-या एका देवळातल्या एका मराठी पूजा-याला बोलावून आम्ही पूजा करवून घेतली, पण आम्ही मुंबईत नवखे असल्यामुळे लुबाडायला चांगले गि-हाईक आहोत असे त्याला वाटले असावे आणि देवाधर्माच्या कामात घासाघीस करणे आम्हाला प्रशस्त वाटले नाही. पण तो अनुभव काही मनाला फारसा भावला नाही. नंतरच्या काळात ओळखी पाळखीमधून आणखी कोणाकोणाला बोलावून पूजा करायचे प्रयत्न आम्ही केले, पण आम्हाला सोयिस्कर अशा दिवशी त्यांना वेळ नसायचा आणि ते येऊ शकत असतील त्या दिवशी आम्हाला काही अडचण असायची असे दोन चार वेळा झाले. त्या काळात आमच्याकडेही फोन नव्हता आणि सेलफोनचा शोधही लागला नव्हता. त्यामुळे त्या पुरोहितांशी संपर्क साधणेही बरेच कठीण असायचे.

अशा प्रकारची आमची शोधाशोध चालली असतांनाच "एकदा आपल्या नाना बिवलकरांना विचारून पहा ना." असे कुणीतरी सांगितले. मी लगेच त्यांचा पत्ता मिळवला आणि वहीत लिहून ठेवला. त्यानंतर जेंव्हा आम्हाला पूजा करायची होती त्या वेळी त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटलो. मी स्वतःची ओळख करून दिली, "मी घारे, आम्ही नंदादेवीमध्ये राहतो. मी पीपीईडीत नोकरीला आहे."
"हां, तुम्हाला कॉलनीत पाहिल्यासारखे वाटते आहे. मी काकोडकरांबरोबर काम करतो." नाना.
ते ऐकून मी चपापलोच. त्या काळातही श्री.अनिल काकोडकर बीएआरसीमध्ये मोठ्या पदावर होते. त्यांच्याबरोबर काम करणारे कोणी सामान्य असणार नाहीत. बिवलकर रहात होते त्या बिल्डिंगमध्येही माझ्या ओळखीतले काही इंजिनियर रहात असत, म्हणजे हे सुद्धा बहुधा ऑफीसर असणार, वयाने माझ्याहून दहा बारा वर्षे मोठे होते, म्हणजे ते चांगल्या पोस्टवर असले तर आमच्या घरी पूजा सांगायला कशाला येतील? पुढे बोलण्याला कुठून सुरुवात करावी ते मला सुचत नव्हते. नाना बिवलकरांनीच विचारले, "तुमचं माझ्याकडे काही काम होतं कां?"
"त्याचं असं आहे की आम्हाला एकदा सत्यनारायणाची पूजा करायची आहे." मी चाचपडत म्हंटले
"छान, या रविवारीच करा ना, चांगला दिवस आहे."  नानांना यातले समजत होते आणि इंटरेस्ट होता हे तर समजले.
"पूजा सांगायला येणारे कोणी तुमच्या ओळखीत आहेत का?" मी हळूच विचारणा केली.
"मी ही रविवारी मोकळाच असतो, मीच येऊ शकेन." नानांनी सांगताच माझी काळजी मिटली.
"सत्यनारायणाच्या पूजेला काय काय लागतं ते तुम्हाला माहीत आहे ना?" नानांनी विचारले.
"साधारण कल्पना आहे. तबक, कलश, ताम्हन, विड्याची पानं, सुपा-या, झालंच तर प्रसादासाठी रवा, साजुक तूप, साखर .... "  आवश्यक पदार्थांची मला आठवतील तेवढी नावे मी सांगितली.
"तुमच्याकडे चौरंग असेलच, त्याला बांधायला केळीचे खुंट, आंब्याची पानं ....बुक्का, अष्टगंध ..." नानांनी आणखी काही नावे सांगितली आणि "पूजेचं सगळं सामान चेंबुरच्या पाटलांच्या दुकानात मिळतं." ही माहितीही दिली.
"हो, आम्ही दर वर्षी त्यांच्याकडूनच गणपतीही आणतो आणि त्या उत्सवाला लागणा-या वस्तूही." मी त्यांना दुजोरा दिल्यावर ते बोलले. "जमेल तेवढं सामान तुम्ही आणालच, त्यातून एकादी गोष्ट राहिली तरी देव काही लगेच रागावत नाही."  थोडक्यात सांगायचे तर "या गोष्टींचे टेन्शन घेऊ नका." असे त्यांनी सांगितले.
ते एवढे प्रॅक्टिकल दिसत आहेत हे पाहून मला थोडा धीटपणा आला. मी त्यांना विचारले, "यातलं कोणकोणतं सामान तुम्ही आणता आणि साधारणपणे दक्षिणा वगैरे ....."
"छे छे, अहो भिक्षुकी हा काही माझा व्यवसाय नाहीय्, या निमित्यानं माझ्याकडून पुण्यकार्य घडतं, देवाची नावं जिभेवर येतात आणि आपल्या लोकांचं काम होतं म्हणून मी एकाद दुसरी पूजा घेतो." त्यांनी पहिल्या भेटीतच मला "आपलेसे" केले होते.  "दक्षिणेचं म्हणाल तर तुमची इच्छा असेल तेवढी हवी तर द्या." 
त्यानंतर पुढील वीस पंचवीस वर्षे दर वर्षी नानाच आमच्या घरी येऊन सत्यनारायणाची पूजा सांगत होते. "एवढेच कां?" असे त्यांनी कधीही बोलण्यातून किंवा देहबोलीमधून दाखवले नाही आणि "इतके कशाला?" असेही नाही. वाढती महागाई आणि माझा वाढता पगार यांचा विचार करून मी आपणहून त्यांना जेवढी दक्षिणा देत होतो तिचा ते हंसून स्वीकार करत होते आणि तोंडभर आशीर्वाद देत होते.

आमच्या घरी पुढच्या रविवारी पूजा करायची हे ठरवताच नानांनी लगेच भिंतीवरल्या कॅलेंडरमध्ये त्याची नोंद करून टाकली. त्यांचे काम किती व्यवस्थित असायचे हे त्यातून दिसत होते, पण त्या वेळी ती गोष्ट माझ्या लक्षात आली नाही. सकाळी आठ वाजता पूजा सुरू करायची असे मोघम बोलणे झाले होते. पण तो काही मुहूर्त नव्हता. त्यामुळे आठ म्हणजे साडेआठ नऊ होणार अशी माझी कल्पना होती. पण रविवारी सकाळी आठ वाजायलाही अजून पंधरा वीस मिनिटे शिल्लक असतांनाच नाना आमच्या घरी येऊन हजर झाले.
"पूजेची तयारी कुठपर्यंत आली?" त्यांनी हंसत हंसत विचारले. आमची तयारी सुरूही झालेली नव्हती हे दिसतच होते. पण त्यांनी तसे दाखवून दिले नाही.
"पूजा कुठे मांडायची ठरवली आहे?" नानांनी पुढला प्रश्न केला. आम्ही हॉलमधला एक भाग रिकामा करून ठेवला होता. तो त्यांना दाखवून त्यांनाच विचारले, "इथे केली तर ठीक राहील ना?"
त्यांनी पूर्व पश्चिम दिशा पाहून घेतल्या आणि देवाचे तोंड कोणत्या दिशेला होईल? त्याच्या समोर आम्ही बसणार आणि बाजूला बसतांना त्यांचे तोंड कोणत्या दिशेला होईल? वगैरे विचार करून सगळ्यांच्या जागा ठरवल्या आणि सांगितले, "सगळे सामान इथे आणून ठेवा आणि तुम्ही दोघे तयार होऊन या."

आम्ही बाजारातून आणलेल्या सगळ्या सामानाच्या पिशव्या तिथेच ठेवलेल्या होत्या, घरातली भांडीही आणून त्यांना दिली. त्यांनी चौरंगाला भिंतीशी समांतर ठेवले, त्याच्या चारी खांबांना केळीचे खुंट बांधले, लाल कापडाची व्यवस्थित चौकोनी घडी करून ती चौरंगावर पसरवून चौरंगाला झाकले. त्या कापडावर मूठभर तांदूळ ठेऊन ते वर्तुळाकारात पसरवले. त्याच्या मधोमध कलशाला ठेऊन त्यावर एक ताम्हन ठेवले आणि त्यात तांदूळ भरले. बाळकृष्णाला ठेवण्यासाठी मधोमध थोडी मोकळी जागा सोडून आठ दिशांना अष्टवसू आणि नवग्रह यांच्या नावाने सुपा-या मांडून ठेवल्या. चौरंगावर ओळीने विड्याची पाने मांडून त्यावर नारळ, सुपारी, बदाम, खारीक, गूळखोबरे वगैरे पदार्थ अनुक्रमाने ठेवले. एका बाजूला समई उभी केली.  फुले, दुर्वा, तुळशीची पाने वगैरे एका तबकात आणि गंध, अक्षता, हळद, कुंकू, नाना परिमलद्रव्ये, कापूर, ऊदबत्त्या, निरांजने वगैरे दुस-या तबकात व्यवस्थितपणे मांडून ठेवली. आम्ही तयार होऊन येईपर्यंत नानांनी सगळी जय्यत तयारी करून ठेवली होती.

पूजेची सगळी तयारी करून देऊन ते आतल्या खोलीत गेले आणि शर्ट पँट उतरवून मुकटा नेसून बाहेर आले आणि आम्ही पूजेला बसलो. सुरुवातीपासूनच यातल्या निरनिराल्या विधीमधली एक एक क्रिया करतांना नाना त्या क्रियेचे महत्व आम्हाला थोडक्यात सांगत होते. देवाची पूजा सुरू करायच्या आधी समईची पूजा करून तिच्या वाती पेटवून उजेड करायचा, भूमीला वंदन करायचे, कलशाची पूजा करून त्यात पाणी भरायचे, शंख, घंटा वगैरेंची पूजा करायची वगैरे वगैरे करण्यामागे हा हेतू असतो की या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात आणि त्या सुस्थितीत आहेत हे निश्चित करून घेतले जाते. एकादा प्रयोग सुरू करायच्या आधी त्यासाठी लागणारी सर्व सामुग्री आणि उपकरणे उपलब्ध आहेत हे पाहून ती तपासून घेतली जातात तसेच हे असते हे माझ्या लक्षात आले. पूजेच्या सुरुवातीला एक संकल्प सोडायचा असतो. त्यावेळी या पूजेचे प्रयोजन काय आहे हे सांगायचे असते. प्रयोगासाठीसुद्धा ऑब्जेक्टिव्ह असावे लागतेच. पूजा करणा-या व्यक्तीचे नाव, त्याच्या वडिलांचे आणि कुळाचे नाव आणि गोत्र सांगून हा कार्यक्रम अमूक वारी आणि तिथीला, तमूक नक्षत्रात चंद्र असतांना, अमक्या तमक्या राशींमध्ये सूर्य, मंगळ, गुरू वगैरे इतर ग्रह असतांना आणि भारतातल्या अमक्या स्थळी केला जात आहे याचा उच्चार केला जातो. हे म्हणजे एकादे लीगल अॅग्रीमेंट करतांना सुरुवातीलाच ते करणा-या पार्टींची नावे, हुद्दे, अॅग्रीमेंटची तारीख, ते करण्याचे ठिकाण वगैरे लिहितात तसे असते. यापूर्वी मी कधी याबद्दल विचार केला नव्हता किंवा मला त्यासंबंधीच्या मंत्रांमधले शब्दच समजले नसल्यामुळे गुरूजींनी सांगितले की "मम" म्हणायचे एवढेच माहीत होते. नाना बिवलकर मात्र सर्व मंत्रामधल्या प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार करून ते सावकाशपणे म्हणत असल्यामुळे ऐकू येत होते आणि अधून मधून त्यातला सारांश सांगतही मला असल्यामुळे ते समजत होते आणि त्यात मजा येत होती.

त्यानंतर आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा करायची असली तर नानांना आधी विचारून ती ठरवत होतो आणि पूजा सांगायला नाना नेहमी येतच होते. त्याशिवायही इतर कारणांनीही आमच्या भेटी होत होत्या, माझे एक हरहुन्नरी मित्र आल्हाद आपटे यांच्या पुढाकारातून एक लहानसा संगीतप्रेमी ग्रुप जमला होता. बहुतेक वेळी आपट्यांच्या घरी किंवा काही वेळा आणखी कोणाच्या घरी जमून आम्ही गाण्याचे कार्यक्रम करत होतो. नानांचा मुलगा विवेक सर्वांना तबल्यावर साथ करायचा. बहुतेक वेळा नानाही गाणी ऐकायला येऊन बसत असत. ते आमच्यापेक्षा वयाने बरेच मोठे होते, पण सर्वांमध्ये सहजपणे मिसळत असत. अभंग, भजन वगैरें गाण्यांवर झांजा वाजवून ताल धरत असत. एकदा आम्ही त्यांनाही गायचा आग्रह केला. त्यांनी इतके छान गाणे म्हंटले की मग सगळ्याच बैठकांमध्ये तेही भाग घ्यायला लागले. त्यांनी शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला होता का ते माहीत नाही, पण "घनघनमाला कधी दाटल्या" यासारखे रागदारीवर आधारलेले गाणे ते दणक्यात गायचे, "पाउले चालती पंढरीची वाट" आणि त्याच चालीवरचे "कानाने बहिरा मुका परी नाही" अशी अनेक गाणी त्यांनी व्यवस्थित सादर केली. हळूहळू आमचे आपसातले संबंध वाढत गेले, एकमेकांच्या घरी जाणेयेणे सुरू झाले.

बीएआरसीच्या नोकरीत असतांना ते अॅडमिनमध्ये होते. एलडीसी, यूडीसी, एसजीसी, पीए वगैरे टप्प्यांमधून ते हळूहळू वर सरकत होते. ऑफिसमधला त्यांचा नेमका हुद्दा मी त्यांना कधी विचारलाही नाही आणि त्यांनीहून तो सांगितलाही नाही. माझ्या ऑफीसच्या कामामध्येही मला कधी त्यांना भेटायला जावे लागले नाही किंवा ते माझ्याकडे आले नाहीत. आमचे संबंध पूर्णपणे पर्सनलच राहिले. पण घरी किंवा कॉलनीमध्ये त्यांना भेटणारे सगळे लोक त्यांना चांगला मान देत होते हे मी पहात होतो. तो त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि सर्वांशी करत असलेल्या चांगल्या वागणुकीतून त्यांच्या व्यक्तीमत्वाला मिळत असावा.

नाना रिटायर व्हायच्या आधीच विवेक बीएआरसीत नोकरीला लागला होता. त्यालाही कॉलनीमध्ये जागा मिळाली आणि नानांचे कुटुंब कॉलनीतच राहिले. त्यांनी तळेगावला एक घर घेऊन ठेवले होते, पण ते तिथे जास्त दिवस रहात नसत, अधून मधून तिकडे रहायला गेले तरी काही ना काही कारणाकारणाने ते अणुशक्तीनगरला येत असत आणि बरेच दिवस रहात असत. यामुळे आम्हाला ते भेटतच राहिले आणि पूजेलाही येत राहिले. पुढे माझ्या सेवानिवृत्तीनंतर मीच कॉलनी सोडली. त्यानंतरसुद्धा एक दोन वेळा ते पूजा सांगायला वाशीलासुद्धा आले होते, पण सत्तरी उलटून गेल्यानंतर त्यांना इतक्या दूर यायला सांगणे बरे वाटत नव्हते. वयोमानानुसार अंगातली शक्ती कमी झाल्याने त्यांना ते जमलेही नसते. एक दोन वेळा आम्ही अणुशक्तीनगरला गेलो असतांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटून आलो. पुढे आम्हालाही अधिक फिरणे जमेनासे झाले. त्यामुळे आमच्यातला संपर्क संपुष्टात आला.

दोन महिन्यांपूर्वी माझी पत्नी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झालेली होती. मला तिथे कोचावर बसलेले पाहून विवेक माझ्याजवळ आला. त्याच्याशी बोलतांना कळले की नाना खूप आजारी आहेत आणि त्यांना पुरुषांच्या वॉर्डात ठेवले आहे. व्हिजिटर्सची वेळ पाहून मी त्यांना पहायला त्या वॉर्डमध्ये गेलो. त्या वेळी मात्र नानांकडे पहावले जात नव्हते. त्यांना स्वतःहून उठता बसताही येत नव्हते, दोन माणसे त्यांना धरून त्यांची कुशी वळवत होते. अर्धवट मिटलेल्या त्यांच्या डोळ्यांत कसलीच चमक दिसत नव्हती. मी तिथे आलेलो त्यांना दिसले तरी की नाही, दिसले असले तरी त्यांनी मला ओळखले की नाही हेच समजत नव्हते. ते एक अक्षरही बोलत नव्हते की त्यांच्या चेहे-यावर कोणते भाव उमटत होते. ते कितपत शुद्धीवर होते याबद्दल शंका वाटत होती. माझ्या आठवणीतला त्यांचा ओळखीचा हसरा उत्साही चेहेरा डोळ्यासमोर आला आणि सगळेच अंधुक होत गेले. त्यानंतरही मला दोन तीन दिवस त्या हॉस्पिटलमध्ये जावे लागले होते पण नानांना पहायला पुन्हा त्यांच्या वॉर्डात जायचा मला धीर झाला नाही. काही दिवसांनी कळले की ते आता राहिले नाहीत. मी ज्यांना अनेक वेळा वाकून नमस्कार केला होता आणि ज्यांनी मला आशीर्वाद दिले होते अशा माणसांमध्ये नानांची गणती होत होती. आता राहिल्या आहेत त्या त्यांच्या अनेक स्मृती.

No comments: