Tuesday, June 07, 2011

व्रतबंध

Sunday, June 05, 2011
व्रतबंध (पूर्वार्ध)

सिलिब्रेटीज हॉटेलच्या प्रेसिडेन्सी बँके हॉलमध्ये बरीच गर्दी जमली होती. लालचुटुक रंगाची मऊमऊ कुशन्स बसवलेल्या शोभिवंत खुर्च्या हॉलभर मांडून ठेवलेल्या होत्या. त्यातल्या बहुतेक खुर्च्यांवर कोणी ना कोणी विराजमान झालेले होते. त्यात पुरुषांची संख्या तशी कमीच होती. गुढग्याच्याही खालपर्यंत पोचणारी पठाणी शेरवानी परिधान केलेले तीन चार जण सोडल्यास इतरांनी चांगल्यापैकी शर्टपँट घातल्या होत्या. महिलावर्गाची संख्या मोठी होती आणि त्यांच्या वेषभूषेमध्ये अगणित प्रकार होते. उत्तरेतील बनारसीपासून दक्षिणेतल्या कांचीपुरमपर्यंत आणि पश्चिमेतल्या पटोलापासून पूर्वेतल्या आसाम रॉसिल्कपर्यंत सर्व त-हेच्या रेशमी साड्या, शालू, पैठणी वगैरे होत्याच, त्याशिवाय विविध प्रकारच्या भारतीय तसेच परकीय फॅशन्सच्या असंख्य ड्रेसेसचे नमूने पहायला मिळत होते. बहुतेकजणी अंगावर ठेवणीतले निवडक आणि आकर्षक दागिने ल्यायल्या होत्या. सर्वांनी चोपडलेल्या सेंट्सच्या सुवासांच्या मिश्रणातून वातावरणात आगळाच गंध दरवळत होता. सौम्य वाद्यसंगीताच्या मधुर लकेरी हॉलमध्ये घुमत होत्या, त्यातच लोकांच्या बोलण्याचे आवाज मिसळत होते. आपल्या आवाजाचे डेसिबल वाढणार नाही याची काळजी घेऊन प्रत्येकजण हळूहळू फुसफुसत असले तरी सर्वांचा मिळून कलकलाट नसला तरी गलबला होत होता. एका लहानशा गावात आयुष्य घालवून साठपासष्ठ वर्षांपूर्वी निवर्तलेल्या रघुनाथशास्त्र्यांचा आत्मा त्या हॉलच्या आसपास घुटमळत होता.

पणतवंडाच्या मुंजीचा सोहळा पाहण्यासाठी स्वर्गातून त्याला पृथ्वीतलावर पाठवले गेले होते. तो आत्मा त्या जागेच्या शोधात हिंडत होता. एकाद्या घराच्या अंगणात बांबू रोवून आणि त्यावर जाजमाचे छत टाकून मांडव घातला असेल, त्याच्या दारापाशी केळीचे खुंट उभे करून ठेवले असतील, आंब्याची पाने आणि झेंडूची फुले यांच्या माळांचे तोरण बांधले असेल, दारापाशी ताशेवाजंत्री वाजत असतील, आत मंत्रघोष चालला असेल, मांडवात यज्ञकुंडाचा धूर भरलेला असेल आणि मागच्या बाजूला पेटलेल्या चुलखंडांचा. उन्हाने रापलेल्या अंगाचे दर्शन घडवणारे उघडबंब ढेरपोटे आचारी त्यावर अगडबंब हंडे आणि पातेली चढवून त्यात अन्न रांधण्यात मग्न असतील, डोक्यावर शेंडी आणि कमरेला लंगोटी किंवा रेशमी चड्डी धारण केलेले अष्टवर्ग बटू धावपळ करत असतील, मोठी माणसे, विशेषतः त्यांच्या आया त्यांच्यावर ओरडून त्यांना शांतपणे बसायला सांगत असतील, वगैरै वगैरे जे दृष्य रघुनाथशास्त्र्यांच्या आत्म्याला अपेक्षित होते ते गावात कुठेच सापडले नाही. प्रेसिडेन्सी हॉलमध्ये मास्टर क्षितिज याची थ्रेड सेरेमनी आहे असे लिहिलेला बोर्ड सिलिब्रेटीज हॉटेलच्या रिसेप्शनपाशी लावला होता, पण इंग्रजी वाचता येत नसल्यामुळे रघुनाथशास्त्र्यांच्या आत्म्याला त्याचा बोध झाला नाही.

रघुनाथशास्त्र्यांच्या आत्म्याला एक गोष्ट ठाऊक नव्हती. ती म्हणजे जेंव्हा त्यांची मुंज लागली होती त्या वेळी त्यांचे खापरपणजोबा बाळंभटाचा आत्मा असाच गोंधळून गेला होता. वैयक्तिक स्वरूपाच्या या धार्मिक विधीसाठी इतकी माणसे का जमली आहेत याचे त्याला नवल वाटले होते. बारा वर्षांसाठी घरापासून दूर जाणार असलेल्या रघूला बालरूपात पाहून घेण्यासाठी हे लोक जमले आहेत म्हंटले तर त्याच्य़ा वियोगाच्या कल्पनेने गंभीर न होता ते इतक्या आनंदात कसे असू शकतात हे त्याला समजत नव्हते. अंगावर उंची नवे कपडे आणि दागिने, डोक्यावर पागोटे वगैरे घालून घोड्यावर बसलेल्या रघुनाथाची बँडबाजाच्या कर्णकर्कश आवाजात मिरवणुक निघाली. तिला भिक्षावळ असे म्हणतात हे ऐकून त्या आत्म्याला झीटच यायची बाकी राहिली असेल.
-------------------------------------------------------------


Tuesday, June 07, 2011
व्रतबंध (उत्तरार्ध)

आतासारख्या दिवसातून ठराविक तास चालणा-या शाळा प्राचीन काळात अस्तित्वात नव्हत्या. शेती, व्यापार, हस्तकौशल्य वगैरे जीवनोपयोगी बाबींचे शिक्षण घरातच मिळत असे. वेदशास्त्रादिकांचे अध्ययन करण्यासाठी चांगल्या गुरूची नितांत आवश्यकता असायची. छापील पाठ्यपुस्तके आणि वह्या वगैरे नसल्यामुळे बहुतेक सारे शिक्षण मौखिक असायचे. गुरूला मुखोद्गत असलेल्या ऋचा, सूक्ते, श्लोक वगैरे शिष्यांकडून तोंडपाठ करून घेणे हा या शिक्षणाचा महत्वाचा भाग असे. त्यातल्या कानामात्रा, -हस्वदीर्घ, अनुस्वार वगैरे प्रत्येक बारकावे अचूक असणे अत्यंत आवश्यक होते. यासाठी शिष्याने एकाग्रचित्त व्हायला पाहिजे. त्याचे मन विचलित होऊ नये, त्याला इतर कशाचा मोह पडू नये म्हणून त्याला कठोर ब्रह्मचर्यव्रत पाळावे लागत असे. त्याने जिभेचे चोचले पुरवायचे नाहीत, मऊ शय्येवर झोपायचे नाही अशा प्रकारची बंधने त्याच्यावर घातली जात. त्या काळातले गुरू म्हणजे ऋषीमुनी नगराबाहेर अरण्यात आश्रम बांधून रहात असत. ज्ञानार्जन करण्यासाठी शिष्यांनाही त्यांच्या आश्रमातच रहावे लागे. त्यांच्या उदरनिर्वाहाचा भार गुरूवर पडू नये म्हणून शिष्यांनी भिक्षा मागून आणावी आणि ती गुरूला अर्पण करावी अशी व्यवस्था केली जात असे. अशी समजूत आहे.

भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा अशी गरीब परिस्थिती असणा-या शिष्यांना या बंधनामध्ये कदाचित फारसे बिकट वाटणार नाही. पण प्राचीन भारतात अन्नधान्य, फळफळावळ, दूधदुभते वगेरेंची रेलचेल होती असेही सांगतात. अशा सुबत्तेत वाढणा-या लाडावलेल्या मुलाने एकदम सर्व मौजमजा आणि आवडीनिवडींचा त्याग करून विरक्त आणि निरीच्छ बनणे हे मला तरी अनैसर्गिक वाटते आणि असल्या नियमांचे किती पालन होत असेल याची शंका वाटते. ज्ञानाची मनापासून अतीव ओढ असलेल्या आणि त्यासाठी पडतील तेवढे कष्ट करण्याची आणि काहीही सहन करण्याची मनाची तयारी असलेल्या एकाद्या असामान्य मुलालाच ते शक्य होत असेल. कदाचित त्या काळात अशा असामान्य मुलांचाच व्रतबंध करून त्यांना गुरूगृही पाठवत असावेत. असे असेल तर व्रतबंधाच्या संस्कारात अशक्यप्राय अशी बंधने सरसकट सगळ्या मुलांवर घालायची रूढी कशी पडली?

जगातील बहुतेक सारे धर्म परमेश्वराला मानतात. तो सर्वसाक्षी, सर्वज्ञ आणि सर्वशक्तीमान देव आणि सामान्य माणूस यांच्या दरम्यान सर्व धर्मांमध्ये काही मध्यस्थ असतात. परमेश्वराची उपासना करण्याव्यतिरिक्त आचरण, आहार वगैरे जीवनातील इतर अनेक अंगांसाठी धर्माच्या नावाखाली असंख्य नियम सांगितले जातात. ते नियम प्रत्यक्ष ईश्वरानेच तयार केले असून ऋषी, मुनी, प्रेषित यांच्या मार्फत ते जगाला सांगितले गेले असल्यामुळे त्यांचे पालन अनिवार्य आहे असेही सांगितले जाते. हे नियम आणि त्यांचा अर्थ सामान्य माणसांना सांगायचे काम हे मध्यस्थ करतात. ही मंडळी धार्मिक वृत्तीची आणि सदाचरण करणारी, देवाच्या जवळची असावी अशी अपेक्षा असते. पुरोहित, शास्त्री, पाद्री, मुल्ला, मौलवी, ग्रंथी, मुनी, भिक्खू वगैरेंच्या रूपात हा वर्ग सर्वत्र दिसतो. या वर्गाला समाजात मानाचे स्थान असते. प्राचीन काळातले भारतातले ऋषीमुनी अरण्यात वनवास करून रहात होते, पण नंतरच्या काळातले धर्मगुरू नगरवासी झाले. त्यांच्या शिष्यांना घर सोडून गुरूगृही जाऊन रहाण्याची आवश्यकता राहिली नाही. या धर्मगुरूंना समाजात आणि राजदरबारी मानसन्मान मिळत होताच, त्याशिवाय द्रव्यप्राप्ती होऊ लागली. आपल्या मुलांनाही असेच सन्माननीय आणि समृद्ध जीवन मिळावे असे सर्वांना वाटणे साहजीक होते.

धर्मगुरूंचे काम सांभाळण्यासाठी विशेष शिक्षण घेऊन दीक्षा घेतली जाते. या शिक्षणाची सुरुवात करण्याची मुंज ही पहिली पायरी असते. ती पार केल्याशिवाय शिक्षणाची सुरुवातच करायची नाही असा परंपरागत निर्बंध होता. आपल्या मुलाला जेवढे जमेल तेवढे तो शिकेल, आपण त्याला संधी उपलब्ध करून दिली पाहिजे असा विचार करून आज प्रत्येक पालक त्याच्या मुलाला शाळाकॉलेजांमध्ये पाठवतो. असाच विचार करून सर्व मुलांचा व्रतबंध करण्याची प्रथा पडली असावी. त्यातले व्रत आणि बंध मागे पडत गेले आणि निव्वळ उपचार शिल्लक राहिला. मेकॉले साहेबाने शालेय शिक्षणपद्धत आणल्यानंतर मुंज आणि शिक्षण यातला संबंध संपला. मुंज केल्यानंतर घेण्याचे शिक्षण फक्त संध्या आणि मंत्र यांच्यापुरते सीमित राहिले. आता ते सुध्दा राहिलेले नाही. एकत्र कुटुंबातल्या घरातल्या आजोबा पणजोबांच्या आग्रहामुळे त्यांच्या समाधानासाठी एक कार्यक्रम केला जाऊ लागला आणि त्याला समारंभाचे स्वरूप प्राप्त झाले. या निमित्याने आप्तेष्टांनी एकत्र जमणे, खाण्यापिण्याची हौस भागवून घेणे, भेटवस्तू देणे, नवे कपडेलत्ते आणि दागिने करणे वगैरे होऊ लागले.

पंचवीस तीस वर्षांपूर्वीच्या काळात थाटात मुंज करण्याचे प्रमाण बरेच कमी झाले होते. गिरगावात एका ठिकाणी सार्वजनिक मुंजी लागत असत आणि प्रत्येक बटूमागे त्याच्या जवळच्या आप्तांसाठी पाच की दहा कूपने मिळत, तेवढेच लोक त्याला उपस्थित रहात असत. काही लोक तीर्थक्षेत्राला जाऊन तिथे मुलाची मुंज लावून येत असत. घरातल्या लग्नकार्याच्या सोबत लहान मुलांच्या मुंजी लावल्या जात. असे काही समारंभ मी पाहिले आहेत. माझ्या परिचयातल्या एका मुलाची मुंज या कशातच झाली नव्हती आणि त्याला त्याचा काही विषादही वाटत नव्हता. पण आधी मुंज झाल्याखेरीज त्याचे लग्न मी लावणार नाही असा भटजीने हट्ट धरला आणि त्याची मुंज, सोडमुंज आणि विवाह हे सगळे विधी एकापाठोपाठ उरकून घेतले.

काळ आणखी पुढे गेल्यानंतर म्हणजे आतापर्यंत मुंज हा प्रकार इतिहासजमा होईल असे मला त्यावेळी वाटत होते. त्यातल्या व्रत आणि बंध या शब्दांना खरोखर काही अर्थ उरलेला नाही. पण मध्यम वर्गीयांची आर्थिक परिस्थिती चांगली सुधारल्यामुळे समारंभ करण्याचा उत्साह मात्र कमी होण्याऐवजी जास्तच वाढलेला दिसतो. परवा मी एका मुंजीला गेलो होतो. आपल्या आजोबासोबत तिथे आलेल्या एका ७-८ वर्षाच्या मुलीने आजोबांना विचारले, "आपण इथे कशाला आलो आहोत?"
"आपल्या विकीच्या मुंजीला"
"मुंज म्हणजे काय? ती कशाला करतात?"
"ती शिक्षणाची सुरुवात आहे. आता त्याने गुरूकडे शिकायला जायचे आहे."
"तो तर आधीच थर्ड स्टँडर्डला आहे. आता कसली सुरुवात? त्याला हॉस्टेलमध्ये पाठवणार आहेत का? पण त्यासाठी चकोट कशाला करायला पाहिजे? मुलं त्याला हसणार नाहीत का? माझी मैत्रिण रुची पण हॉस्टेलात राहते, तिची पण मुंज केली होती का? .........."
नातीचे प्रश्न संपत नव्हते आणि आजोबांना काही केल्या उत्तरे सापडत नव्हती. अखेर मी तिची समजूत घातली, "अगं विकीच्या आईबाबांना एक मोठी पार्टी द्यायची होती, सगळ्या रिलेटिव्ह्जना आणि फ्रेड्सना बोलवायचे होते, आपले नवे ड्रेसेस, ज्युवेलरी त्यांना दाखवायची होती, त्यांच्या नव्या फॅशन्स पहायच्या होत्या. तू नाही का किती मस्त ड्रेस घातला आहेस? हे सगळं एन्जॉय करायसाठी आपण इथे आलो आहोत. "

Thursday, June 02, 2011

अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ५


बॉइलिंग वॉटर रिअॅक्टर (बी.डब्ल्यू.आर)


सगळ्या प्रकारच्या व्यावसायिक न्यूक्लियर पॉवर स्टेशन्समध्ये पाण्याची वाफ करून ती टर्बाईनला पुरवली जाते, पण 'बी.डब्ल्यू.आर' या प्रकारात रिअॅक्टर व्हेसलमध्येच पाण्यापासून वाफ तयार होते. इतर प्रकारांच्या रिअॅक्टर्समध्ये त्यासाठी वेगळी उपकरणे असतात. बी.डब्ल्यू.आर.मध्ये 'एन्रिच्ड युरेनियम' हे फ्यूएल असते. 'मॉडरेटर' आणि 'कूलंट' या दोन्ही कामासाठी 'डिमिनराइज्ड लाइट वॉटर' (शुध्द केलेले साधे पाणी) वापरले जाते. रिअॅक्टरमधील प्रायमरी कूलंटच मॉडरेशनचे काम करतो. वरील क्र. १ या चित्रात बॉइलिंग वॉटर रिअॅक्टर असलेल्या पॉवर स्टेशनची रचना ढोबळ मानाने दाखवली आहे. रिअॅक्टर, टर्बाईन, कंडेन्सर आणि पंप यामधून पुनःपुनः फिरत राहणारे पाणी व वाफ यांचे अभिसरण अखंड चालत राहते.

रिअॅक्टरमध्ये अणूंच्या भंजनातून निर्माण झालेली जितकी ऊष्णता वाफेला मिळते त्यातल्या निम्म्याहून कमी ऊर्जेचे रूपांतर जनरेटरमध्ये विजेत होते आणि बाकीची ऊर्जा वाफेसोबत टर्बाईनच्या बाहेर येते. त्या वाफेला थंड करण्यासाठी कंडेन्सरमधील नळ्यांमध्ये थंड पाणी खेळत ठेवलेले असते. वाफेमध्ये असलेली ऊष्णता त्या पाण्याकडे जाऊन ते थोडे तापते आणि वाफेला थंड केले गेल्यामुळे तिचे पुन्हा पाण्यात रूपांतर होते. ते होत असतांना कंडेन्सरमधील नळ्यांमध्ये वहात असलेल्या पाण्यातून तिच्यातली ऊर्जा वीजकेंद्रातून बाहेर जाते आणि बाहेरील वातावरणात विलीन होते. रिअॅक्टरमध्ये निर्माण झालेल्या अणूऊर्जेमधील फक्त तीस चाळीस टक्के ऊर्जेचे विजेत रूपांतर होऊन साठ सत्तर टक्के स्थानिक पर्यावरणात मिसळते. पण याला इलाज नसतो. सुमारे दोन तृतीयांश ऊर्जेला वीजकेंद्राबाहेर टाकून देणारे असले कंडेन्सर कशाला हवे असा विचार मनात येईल, पण ते नसले तर टर्बाईनमधून बाहेर निघणारी वाफ तिच्याकडे असलेल्या ऊर्जेसकट थेट वातावरणात जाईल. त्यामुळे तिच्याकडे असलेली ऊर्जाही वाया जाईल आणि त्याबरोबर अत्यंत शुध्द असे मौल्यवान पाणीही नष्ट होईल.

शिवाय टर्बाईनमधील वाफ थेट वातावरणात सोडली तर ती तितक्याच दाबाने बाहेर पडेल पण कंडेन्सरमध्ये तिचे पाण्यात रूपांतर होतांना तिने व्यापलेली जागा रिकामी झाल्यामुळे अंशतः निर्वात पोकळी (पार्शल व्हॅक्यूम) निर्माण होते. वातावरणाएवढ्या दाबापासून ते अंशतः निर्वात पोकळीपर्यंतचा वाफेचा जास्तीचा प्रवास टर्बाईनमधून होत असल्यामुळे त्या वाफेतल्या ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग होतो. या कारणांमुळे वीजनिर्मितीच्या प्रक्रियेत 'कंडेन्सर' हा सुध्दा एक महत्वाचा घटक ठरतो. औष्णिक विद्युत केंद्रातही (थर्मल पॉवर स्टेशनमध्ये) असेच घडते. रेल्वे इंजिन सोडले तर इतर बहुतेक ठिकाणी वाफेचा उपयोग झाल्यानंतर कंडेन्सरमधून त्यातले पाणी परत मिळवले जाते.

बॉइलिंग वॉटर रिअॅक्टरच्या मुख्य पात्राची (रिअॅक्टर व्हेसलची) अंतर्गत रचना चित्र क्र. २ मध्ये दाखवली आहे. या पात्राचा आकार एका ऊभ्या कॅपसूलसारखा असतो. त्याचा मुख्य भाग दंडगोलाकार (सिलिंड्रिकल) असतो आणि त्याच्या दोन्ही टोकांना घुमटाचा आकार दिलेला असतो. या मुख्य पात्राच्या आत एक दंडगोलाकार उपपात्र ठेवलेले असते, याला 'कोअर श्राऊड' असे म्हणतात. जेवढ्या भागात इंधन ठेवलेले असते आणि त्यातून ऊष्णता निर्माण होते त्याला 'कोअर' असे म्हणतात. कोअरचे आवरण म्हणजे 'कोअर श्राऊड' झाले. फ्यूएल आणि कंट्रोल रॉड्स यांना विवक्षित जागी व्यवस्थित रीत्या बसवण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार त्यांना आतबाहेर करण्यासाठी सोयिस्कर अशी रचना या श्राऊडमध्ये केली जाते. पंपामधून येणारे पाणी कोअरच्या वरच्या भागात रिअॅक्टरमध्ये येते आणि कोअरच्या बाहेरील अंगाने वहात खालच्या भागात आल्यानंतर ते दिशा बदलून कोअरमधील फ्यूएलरॉड्सला स्पर्श करत वर चढते. तापलेल्या फ्यूएल रॉड्समुळे त्यात वाफेचे बुडबुडे तयार होतात आणि मागून येत असलेल्या पाण्याच्या रेट्याने ते वेगाने वर चढत जातात. ते एकत्र येऊन तयार झालेली वाफ रिअॅक्टर व्हेसलच्या वरच्या भागात जमा होत जाते. 'स्टीम सेपरेटर' नावाच्या उपकरणात त्या वाफेसोबत आलेले पाण्याचे कण वेगळे काढले जातात आणि बाष्पीभवनासाठी खालच्या भागात साभार परत पाठवले जातात. सेपरेट झालेली वाफ 'स्टीम ड्रायर' नावाच्या उपकरणात जाते. या भागात पाण्याच्या उरल्यासुरल्या थेंबांचे वाफेत रूपांतर होते आणि सुकी झालेली वाफ (ड्राय स्टीम) टर्बाईनकडे पाठवली जाते. टर्बाईनमध्ये वेगाने गेलेल्या वाफेच्या झोतात पाण्याचे थेंब असल्यास त्यांच्यामुळे टर्बाईनच्या पात्यांची झीज (इरोजन) होते. ते टाळण्यासाठी यासारख्या काही उपाययोजना केल्या जातात.

रिअॅक्टरमधून वाहणा-या पाण्याच्या या मुख्य प्रवाहाशिवाय एक उपप्रवाह वहात असतो. रिअॅक्टर व्हेसलच्या खालच्या भागातून सतत थोडे पाणी बाहेर काढून ते सूक्ष्म छिद्रे असलेल्या चाळणीतून गाळले जाते (फिल्टरिंग) आणि त्याचे शुध्दीकरण (प्यूरिफिकेशन) करून झाल्यावर ते पाणी पुन्हा मुख्य प्रवाहात आणून सोडले जाते. यामुळे या अत्यंत महत्वाच्या पाण्यात कचरा साठत नाही. काही ठिकाणी या पाण्यातील ऊष्णतेपासून कमी दाबाची वाफ तयार करतात आणि वीजनिर्मितीसाठी तिचा उपयोग करून घेतात. रिअॅक्टर व्हेसलचा वरचा भाग स्टीम सेपरेटर आणि स्टीम ड्रायर यांनी व्यापलेला असल्यामुळे कंट्रेल रॉड्सना वरखाली करणारी यंत्रणा खालच्या बाजूने बसवलेली असते. या यंत्रांना चालवण्यासाठी वीज लागते तसेच त्यांची देखभाल व दुरुस्ती करावी लागते. या कारणांमुळे ही यंत्रे वेगळ्या खोलीत असतात आणि त्यांना ऊभ्या दांड्यांच्या द्वारे कंट्रोल रॉड्सबरोबर जोडले जाते.

अॅटॉमिक रिअॅक्टरला 'शट डाऊन' करून त्यामध्ये चालत असलेली भंजनाची क्रिया बंद केली तरीसुध्दा त्यानंतर त्यातून ऊष्णता बाहेर पडतच राहते. युरेनियममधून अणूऊर्जा बाहेर पडणे थांबले असले तरी त्याच्या फिशन प्रॉडक्ट्समधून निघणा-या किरणांमधून ती ऊर्जा बाहेर निघत राहते. निखारे विझल्यानंतरसुध्दा बराच वेळ राख धगधगत राहते, तसाच पण खूप मोठ्या प्रमाणावर हा प्रकार आहे. ही क्रिया हळूहळू आपोआप कमी कमी होत असते, पण तिला प्रतिबंध करण्याचा कोणताही उपाय अस्तित्वात नाही. ही नको असलेली ऊष्णता वाहून नेण्याची व्यवस्था करणे एवढेच करणे शक्य तसेच आवश्यक असते आणि त्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केलेल्या असतात. रिअॅक्टरमधून जाणारे मुख्य आणि उपप्रवाह या दोन्हींच्या मार्गात निरनिराळे 'हीट एक्स्चेंजर्स' बसवलेले असतात. रिअॅक्टरमध्ये तप्त होऊन बाहेर निघालेले पाणी यात जाऊन थंड होऊन रिअॅक्टरमध्ये परत येते.

रिअॅक्टरमधून वाहणा-या पाण्याला 'प्रायमरी कूलंट' असे म्हणतात. त्याच्या मार्गावरील उपकरणे किंवा पाईपलाईन यात कोठेही बिघाड झाला आणि त्या पाण्याची गळती झाली तर रिअॅक्टरला पुरेसे पाणी मिळणार नाही. याला 'लॉस ऑफ कूलंट अॅक्सिडेंट' (लोका) असे म्हणतात. त्यामुळे रिअॅक्टरमधले तपमान वाढून ते धोकादायक ठरू शकते. यामुळे अशा परिस्थितीत प्रायमरी कूलंट सर्किटमध्ये जास्त पाणी टाकण्याचे अनेक उपाय केलेले असतात. तसेच रिअॅक्टरच्या बाहेर किरणोत्सर्ग होऊ नये यासाठी रिअॅक्टरच्या सर्व बाजूंनी अत्यंत कडेकोट बंदोबस्त करून ठेवलेला असतो. रिअॅक्टर व्हेसलच्या सर्व बाजूने एक एअरटाइट 'कंटेनमेंट' असते. ते पाइपलाइन्सच्या सहाय्याने एका 'व्हेपर सप्रेशन पूल'ला जोडलेले असते. रिअॅक्टरमधून वाफ बाहेर निघाल्यास ती आधी या कंटेनमेंटच्या 'ड्रायवेल' या भागात येते आणि पाइपांमधून पूलमधील पाण्यात सोडली गेल्याने ती त्या पाण्यात शोषली जाते. त्या वाफेसोबत आलेली ड्रायवेलमधली हवा 'वेटवेल'मध्ये जाते. सप्रेशन पूलमधील पाण्याला थंड करण्याची वेगळी व्यवस्था असते, गरज पडल्यास त्यात भर घालण्याची सोय केलेली असते, तसेच त्यातले पाणी पंपाने उपसून ते तडक रिअॅक्टरमध्ये नेऊन सोडण्याची व्यवस्थासुध्दा असते. जगातील शंभरातल्या नव्याण्णऊ रिअॅक्टरमध्ये यातल्या कशाचीच प्रत्यक्ष गरज पडलेली नाही. पण ती तरतूद करणे अत्यंत आवश्यक असते आणि प्रसंग पडला तर त्यांचा उपयोग करून संभाव्य अनर्थ टाळता येतो.

या तरतुदी अंमलात आणण्यासाठी काही पंप चालणे, व्हॉल्व्हची उघडझाप होणे गरजेचे असते. ते काम करण्यासाठी विजेचे अनेक पर्याय दिलेले असतात. पॉवर स्टेशनमध्ये तयार होणारी वीज, बाहेरच्या ग्रिडमधून येणारी वीज, इमर्जन्सी डिझेल जनरेटर, बॅटरी बॅक अप अशा निरनिराळ्या स्त्रोतांकडून ती येत असल्याने सहसा तिचा तुटवडा पडत नाही आणि त्याच वेळी नेमका लोका अपघात होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. फुकुशिमा येथील दाइ इची या एका स्टेशनमध्ये सुनामीमुळे आधी विजेचे सगळेच स्त्रोत एका झटक्यात निकामी झाले आणि त्यामुळे लोकासारखी परिस्थिती उद्भवली. टँकमध्ये साठवलेले पाणी आणि बॅटरी बँक या तरतुदी काही काळ कामाला येतात आणि नव्या पुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी सवड मिळते. एरवी तेवढ्या अवधीमध्ये ती करता आली असती, पण विक्रमी भूकंप आणि सुनामी यांनी केलेल्या पडझडीने जपानच्या त्या भागातले सारे जनजीवनच उध्वस्त झाल्यामुळे केलेले शर्थीचे प्रयत्न तोटके पडले. फुकुशिमा याच ठिकाणी असलेल्या दुस-या पॉवर स्टेशनमध्ये मात्र या आणीबाणीच्या व्यवस्था कामाला आल्या आणि त्या स्टेशनमध्ये मोठा अपघात झाला नाही.

रिअॅक्टरमध्ये प्रायमरी कूलंट या कामासाठी वापरले जात असलेले पाणी गाळून घेतले असले तरी त्या गाळण्याच्या (फिल्टरच्या) सूक्ष्म छिद्रातून आरपार जाऊ शकणारे अतिसूक्ष्म कण शिल्लक राहतात. तसेच आयन एक्स्चेंजरमध्ये शुध्द केलेल्या पाण्यातही अत्यल्प प्रमाणात विरघळलेले क्षार शिल्लक असतातच. पीपीएम (पार्ट्स पर मिलियन किंवा दशलक्षात अमूक एवढे भाग)इतक्या कमी प्रमाणात ही अशुध्द द्रव्ये त्यात शिल्लक राहतात. एरवी त्यांचा काही उपसर्ग नसतो. पण हे पाणी रिअॅक्टरमधून जात असतांना तेथील न्यूट्रॉन्सच्या साम्राज्यात काही न्यूट्रॉन्स या अशुध्द द्रव्यांमध्ये शोषले जातात, तसेच पाण्यामधील हैड्रोजन आणि ऑक्सीजन या मूलद्रव्यांवरसुध्दा न्यूट्रॉन्स परिणाम करतात. यामुळे हे पाणी रेडिओअॅक्टिव्ह बनते. याच पाण्याची वाफ टर्बाईन, कंडेन्सर वगैरेमध्ये जात असल्यामुळे हा सारा भाग माणसांनी प्रवेश करण्यायोग्य रहात नाही. रिअॅक्टर सुरू असतांना निरीक्षण किंवा देखरेख या कामासाठीसुध्दा कोणीही या भागात जाऊ शकत नाही. ही कामे करण्यासाठी रिअॅक्टर शट डाऊन करून रेडिओअॅक्टिव्हिटी कमी होण्याची वाट पहात काही काळ थांबावे लागते. बॉइलिंग वॉटर रिअॅक्टरमध्ये ही एक उणीव असते.

जगभरात बी.डब्ल्यू.आर. या प्रकारचे ९२ रिअॅक्टर्स असून त्यांची एकंदर क्षमता ८४००० मेगावॉट्स एवढी आहे. हा प्रकार दुस-या क्रमांकावर आहे आणि बरीच वर्षे राहणार आहे. भारतामध्ये तारापूर येथे उभारलेला सर्वात पहिला अणूविद्युत प्रकल्प या प्रकारचा होता. त्यानंतर पुन्हा अशा प्रकारच्या रिअॅक्टरची उभारणी केली गेली नाही.

Friday, May 27, 2011

अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ४




एका पातेल्यात नळाचे पाणी घेऊन शेगडीवर तापवायला ठेवले की ते गरम होत जाते. त्या पाण्याचे तपमान वाढत वाढत सुमारे १०० अंश सेल्सियसच्या जवळ (पाण्याच्या उत्कलनबिंदू एवढे) पोचले की ते द्रवरूप पाणी उकळायला लागते आणि त्याचे रूपांतर झपाट्याने वायूरूप वाफेत होऊ लागते. त्यानंतर पाण्याचे तपमान वाढणे थांबून ते उत्कलनबिंदूपाशी थबकून राहते आणि पाण्याची वाफ होऊन ती हवेमध्ये पसरत जाते. प्रेशर कूकरच्या हवाबंद पात्रातून या वाफेला बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नसल्यामुळे ती आतल्या आत कोंडली जाते आणि तिचा दाब वाढत जातो. दाब वाढल्यामुळे पाण्याच्या उत्कलनबिंदूत वाढ होते आणि पाण्याचे तपमान शंभरावर (सुमारे १२० अंशाकडे) जाते. जास्त तपमान आणि दाब यामुळे त्या पाण्याला डाळ, तांदूळ वगैरेंच्या दाण्यांच्या आत शिरायला मदत मिळते आणि अन्न लवकर शिजते. वाफेचा दाब वातावरणातील हवेच्या सुमारे दुप्पट एवढा झाला तर त्या दबावामुळे कूकरची शिटी वर उचलली जाते आणि त्यात तयार झालेल्या फटीतून थोडी वाफ बाहेर पडते. त्यामुळे आतला दाब कमी होतो. तो कमी झाला की स्वतःच्या वजनामुळे शिटी खाली बसते. शेगडीच्या आंचेमुळे त्यानंतर नव्याने निर्माण झालेल्या वाफेचा दाब पुन्हा वाढला की शिटीद्वारे तो कमी केला जातो. अशा प्रकारे कूकरमधील वाफेच्या दाबावर नियंत्रण ठेवले जाते.

औष्णिक विद्युत केंद्रात (थर्मल पॉवर स्टेशनमध्ये) एकाद्या हॉलएवढ्या मोठ्या आकाराची भट्टी (फर्नेस) असते. दिवसाला कित्येक वॅगन कोळसा किंवा कित्येक टँकर्स तेल जाळून टाकणारी भयंकर आग त्या फर्नेसमध्ये सतत जळत असते. त्या प्रखर अग्नीच्या ज्वाळा बॉयलरमधील पाण्याची वाफ बनवतात आणि त्या वाफेला बंदिस्त जागेत कोंडल्यामुळे तिचा दाब हवेच्या दाबाच्या शंभरपटीच्या आसपास इतका होतो. मोठमोठ्या नळांतून (पाइपातून) वहात ही वाफ स्टीम टर्बाईन नावाच्या यंत्राकडे जाते. या यंत्रामध्ये एकमेकांना जोडलेली अनेक चक्रे असतात आणि त्या प्रत्येक चक्राला कडेने अनेक पाती (व्हेन्स) बसवलेली असतात. उच्च दाबाची सामर्थ्यशाली वाफ (हाय प्रेशर स्टीम) सुसाट वेगाने टर्बाईनमध्ये घुसते आणि तिच्या मार्गात आडव्या येणा-या पात्यांना बाजूला ढकलत पुढे जात राहते. वाफेने केलेल्या या प्रहाराने त्या पात्यांना जोडलेली टर्बाईनची चक्रे वेगाने फिरतात. टर्बाईनच्या दांड्याला (शाफ्टला) जनरेटर जोडलेला असतो. त्यात वीजेची निर्मिती होते. सायकलच्या चाकाला जोडलेल्या डायनॅमोमध्ये कशी वीज तयार होते हे ग्रामीण भागातील लोकांनी पाहिले असेल, तसेच मोटार किंवा स्कूटरच्या इंजिनाला जोडलेल्या यंत्रातून वीज तयार होऊन बॅटरीला चार्ज करत असते हे बहुतेकांना ठाऊक असते. पॉवर स्टेशनमधील जनरेटर याच तत्वावर चालतो पण त्याची क्षमता काही लाख किंवा कोटीपटीने जास्त असते.

टर्बाईनची चक्रे फिरवून झाल्यानंतर मोकळी सुटलेली वाफ कंडेन्सर नावाच्या अवाढव्य उपकरणात जाते. याचा आकारही मोठ्या खोलीसारखा असतो. पण त्यात रिकामी जागा नसते. हजारो लहान लहान नळ्यांच्या जाळ्यांनी त्यातील सर्व जागा व्यापलेली असते. नदी, तलाव किंवा समुद्रातले थंड पाणी या नळ्यांमध्ये खेळत असते. या नळ्यांना स्पर्श करताच वाफेचे पुन्हा पाण्यात रूपांतर (कंडेन्सेशन) होते आणि ते पाणी कंडेन्सरच्या तळाशी साठत जाते. पंपांच्या सहाय्याने ते पाणी उपसून पुन्हा बॉयलरकडे पाठवले जाते. याप्रमाणे पाण्याचे रूपांतर वाफेत आणि वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करण्याचे चक्र अव्याहतपणे चालत राहते. मात्र हे करतांना ते जल (पाणी) भट्टीमध्ये जळत असलेल्या अग्नीकडून ऊर्जा घेते आणि जनरेटरमध्ये त्या ऊर्जेचे रूपांतर विद्युतशक्तीमध्ये करते. तारांमार्फत ही वीज गावोगावी आणि घरोघरी पोचवली जाते.

अणूपासून प्रचंड ऊर्जा मिळवणे साध्य झाले आणि ही ऊर्जा आपल्याला ऊष्णतेच्या रूपामध्ये कशा प्रकारे मिळू शकते याचे आकलन झाल्यानंतर तिचे रूपांतर विजेत करण्यासाठी वरील पारंपरिक मार्गाचा अवलंब करणे साहजीकच होते. ऊष्णता मिळवण्यासाठी कोळसा किंवा तेलासारख्या इंधनाच्या ज्वलनाऐवजी अणूऊर्जेचा उपयोग करणे एवढा बदल केला की झाले. त्यामुळे भट्टी (फर्नेस) आणि बॉयलर यांच्याऐवजी अणूभट्टी (रिअॅक्टर)ची योजना केली गेली. पण या दोघांमध्ये काही मूलभूत फरक आहेत. ते जाणून घेणे आवश्यक आहे. पारंपरिक इंधने भट्टीत जळून नाहीशी होतात, त्यांच्या ज्वलनातून निघालेला धूर धुराड्यांमधून वातावरणात सोडला जातो आणि उरलेली राख भट्टीच्या खाली जमत जाते. या दोन्ही गोष्टींची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी सविस्तर व्यवस्था करावी लागते. तसेच भट्टीत घालण्यासाठी इंधनाचा आणि त्याच्या ज्वलनासाठी आवश्यक असा भरपूर हवेचा अखंड पुरवठा करावा लागतो. अणूशक्तीचे इंधन जळून नष्ट होत नाही, पण खूप काळ पुरेल एवढा त्याचा साठा सुरुवातीलाच रिअॅक्टरमध्ये करून ठेवावा लागतो. नवे इंधन गरजेनुसार पुरवावे लागत असले तरी त्याची सर्व यंत्रणा मात्र पहिल्यापासून सुसज्ज ठेवावी लागतेच. पण इंधन वेगळ्या प्रकारचे असल्यामुळे ती यंत्रसामुग्री सर्वस्वी वेगळी असते.

अणूशक्तीतून ऊष्णता निर्माण करण्यासाठी जे रिअॅक्टर आजकाल उपयोगात येत आहेत त्यातील प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे आहेत.
१. बॉइलिंग वॉटर (बीडब्ल्यूआर)- या रिअॅक्टरमध्येच पाण्याची वाफ होते आणि ती टर्बाईनला पुरवली जाते
२. प्रेशराइज्ड वॉटर (पीडब्ल्यूआर)- या रिअॅक्टरमध्ये पाणी तापते, पण त्याचा दाब इतका जास्त ठेवलेला असतो की ते अतीशय गरम झालेले पाणी द्रवरूपातच रिअॅक्टरमधून बाहेर पडते. स्टीम जनरेटर नावाच्या वेगळ्या उपकरणात या ऊष्ण पाण्यापासून वाफ तयार केली जाते.
३. प्रेशराइज्ड हेवी वॉटर (पीएचडब्ल्यूआर) - वरील प्रकारेच, पण यात जड पाण्याचा उपयोग केला जातो.
४. गॅस कूल्ड (जीसीआर)- यात निर्माण झालेली ऊष्णता आधी कार्बन डायऑक्साई़ड वायू ग्रहण करतो आणि नंतर तिचा उपयोग वाफ बनवण्यासाठी केला जातो.

. . . . . . . . . . . . (क्रमशः)

Tuesday, May 17, 2011

अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ३

कोणत्याही पदार्थाच्या अणूला न्यूट्रॉनने धडक दिली तर त्याचे तीन निरनिराळे परिणाम होण्याची शक्यता असते. तो अणू युरेनियमचा असल्यास त्याचे 'फिशन' (भंजन किंवा विखंडन) होऊ शकेल, नसल्यास कदाचित तो अणू त्या न्यूट्रॉनला 'कॅप्चर' करेल म्हणजे त्याला स्वतःमध्ये सामावून घेईल आणि त्यामुळे त्या न्यूट्रॉनचे 'अॅब्सॉर्प्शन' होईल किंवा यातील काहीही न होता तो न्यूट्रॉन 'स्कॅटर' होईल म्हणजे तो त्या अणूला धडकून निराळ्या दिशेने चालता होईल. अणू ऊर्जेचा वापर करण्यासाठी तयार केलेल्या रिअॅक्टरमध्ये फिशन, अॅब्सॉर्प्शन आणि स्कॅटर या तीन्ही शक्यतांचा कल्पकतेने उपयोग करून घेतला जातो. या क्रियांची काही ठळक वैशिष्ट्ये आणि त्यांचे दुष्परिणाम (साइड इफेक्ट्स) समजून घ्यायला हवेत.

फिशनः यामधून निघालेल्या ऊर्जेचा उपयोग करून घेण्यासाठीच हा सारा खटाटोप असतो आणि त्यामधून निघालेल्या सुट्या न्यूट्रॉन्समुळे 'फिशन रिअॅक्शन'ची साखळी अखंड चालत राहून आपल्याला ही ऊर्जा सातत्याने मिळत राहते. पण या क्रियेतून निर्माण झालेले 'फिशन फ्रॅग्मेंट्स' (युरेनियमच्या अणूचे दोन तुकडे) हे रेडिओअॅक्टिव्ह ब्रह्मराक्षस मात्र फारच त्रासदायक असतात, तसेच त्यांना दीर्घायुष्याचे वरदान मिळालेले असल्यामुळे त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करावे लागतात, त्यात खूप खर्च येतो आणि तरीसुध्दा त्यांची भीती टांगत्या तलवारीप्रमाणे कायम राहते.

अॅब्सॉर्प्शनः या क्रियेत न्यूट्रॉनचे वेगळे अस्तित्व संपुष्टात येते, पण ज्या अणूमध्ये तो मिसळून जातो त्या अणूवर त्याचा परिणाम होतो. काही बाबतीत ते अणू त्यांच्याच मूलद्रव्याचे (कार्बन, हैड्रोजन यासारख्यांचे) वेगळे रूप (आयसोटोप) बनतात आणि त्यांचे रासायनिक गुणधर्म बदलत नाहीत, तर काही बाबतीत त्या अणूंचे एका वेगळ्या मूलद्रव्यामध्ये परिवर्तन होते आणि त्यामुळे त्यांचे सगळेच गुणधर्म बदलतात. अणूंचे हे नवे रूप किंवा वेगळ्या मूलद्रव्यांचे नवे अणू बहुतेक वेळी रेडिओअॅक्टिव्ह असतात. त्यामुळे फिशन फ्रॅग्मेंट्सच्या जोडीने त्यांचासुध्दा उपसर्ग होतो. शिवाय काही बाबतीत ते नवे अणू न्यूट्रॉन्सचे शत्रू असतात (त्यांना अॅब्सॉर्ब करतात) आणि रिअॅक्टरमधील 'चेन रिअॅक्शन'ला अडथळा बनतात, तर काही बाबतीत याच्या उलट होते. हवेला खाली दाबून आकाशात उंचावर उडणा-या विमानावर वातावरणामधील बदलाचा (हवेचा दाब कमी अधिक होण्याचा) परिणाम होतो आणि त्यामुळे विमान चालकाला त्यानुसार त्याचे नियंत्रण करावे लागते, तसेच रिअॅक्टरला कंट्रोल करतांना या जास्तीच्या अडचणींवर मात करून रिअॅक्टर चालवत ठेवण्याची आवश्यकता असते. मात्र युरेनियम २३८ आणि थोरियम २३२ यांचे रूपांतर अनुक्रमे प्ल्युटोनियम आणि युरेनियममध्ये होते आणि त्यांचे फिशन होणे शक्य असल्यामुळे त्यांच्य़ापासून आपल्याला लगेच जास्तीची अणूऊर्जा मिळू लागते किंवा भविष्यात मिळवता येते. यामुळे हा बदल मात्र फायदेशीर असतो.

स्कॅटरः क्रिकेटच्या पिचवर आपटल्यानंतर तो चेंडू कमी किंवा जास्त प्रमाणात उसळी घेतो, वळतो किंवा मंदावतो. त्याच प्रमाणे अणूला धडकल्यानंतर तो न्यूट्रॉन कसा परावर्तित होईल यात बरीच विविधता असते. पण या बाबतीत काही सर्वसाधारण नियम दिसतात. एका लहानशा गोटीने दुस-या गोटीवर मारले तर ती दुसरी गोटी वेगाने पुढे जाते आणि पहिल्या गोटीचा वेग कमी होतो किंवा ती तिथेच थबकते, पण तीच लहानशी गोटी लोखंडाच्या मोठ्या गोळ्यावर आपटली तर त्या गोळ्यावर फारसा परिणाम होत नाही आणि ती गोटी वेगाने परत येते. याच प्रमाणे साधारणपणे न्यूट्रॉनच्याच आकाराच्या हैड्रोजनच्या अणूला तो धडकला तर त्याचा वेग पटकन कमी होतो, पण तो न्यूट्रॉन त्याच्या दोनशेपट मोठ्या शिसाच्या अणूवर आपटला तर मात्र वेगाने परावर्तित होतो. या टक्करीमधून त्याचा वेग मंदावत नाही. कार्बनचा अणू हैड्रोजनपेक्षा मोठा असला तरी तसा लहानच असल्यामुळे त्याचाही मॉडरेशनच्या कामासाठी उपयोग होतो.

रिअॅक्टरसाठी फ्यूएल, मॉडरेटर, अॅब्सॉर्बर आणि कूलंट ठरवतांना वरील गुणधर्मांचा विचार केला जातो. युरेनियम या इंधनामध्ये त्याच्या दोन आयसोटोप्सचे मिश्रण असते. आज निसर्गात उपलब्ध असलेल्य़ा युरेनियममध्ये 'यू २३५' हा भंजनक्षम (फिसाइल) उपयुक्त पदार्थ फक्त ०.७ टक्के एवढा असतो, तर 'यू २३८' हा निष्क्रिय पदार्थ ९९.३ टक्के इतक्या जास्त प्रमाणात असतो. म्हणजे १४० अणूंपैकी फक्त एकच अणू भंजन पावू शकतो आणि त्यातून आपल्याला अणूऊर्जा मिळते. आजकाल बहुतेक रिअॅक्टरमध्ये 'एन्रिच्ड युरेनियम' वापरतात. त्यात 'यू २३५' चे प्रमाण २-४ टक्क्यापर्यंत वाढवल्याने ते इंधन अधिक प्रभावी असते. रिअॅक्टर चालत असतांना त्यातल्या काही यू २३८ अणूंचे प्ल्युटोनियममध्ये परिवर्तन होते आणि त्यांचे भंजन होऊ लागते. पण यू २३५ चे प्रमाण जितके कमी होते तितके प्ल्युटोनियमचे प्रमाण वाढत नाही. त्यामुळे एकंदरीने पाहता हे इंधन क्षीण होत जाते आणि त्याला रिअॅक्टरच्या बाहेर काढून नव्या इंधनाचा भरणा करावा लागतो.

यू २३५ चे प्रमाण ७०-७५ टक्क्यांच्याहून जास्त ठेवले तर तो रिअॅक्टर कोणत्याही मॉडरेटरच्या सहाय्याशिवाय सुध्दा चालू शकतो. अशा रिअॅक्टरला 'फास्ट रिअॅक्टर' म्हणतात. फास्ट न्यूट्रॉन्सची फिशन घडवून आणण्याची क्षमता कमी असल्यामुळे अत्यंत समृध्द इंधनातून त्यांची संख्या खूप जास्त ठेवली जाते. त्यामधील बहुसंख्य न्यूट्रॉन्स 'एस्केप' होतात, म्हणजे रिअॅक्टर व्हेसलच्या बाहेर जातात. इंधनाच्या सर्व बाजूंनी यू २३८ किंवा नैसर्गिक युरेनियमचे मोठे आणि दाट कोंडाळे (ब्लँकेट) करून ठेवले तर रिअॅक्टरमधून बाहेरच्या दिशेने जाणारे काही न्यूट्रॉन्स त्यांत कॅप्चर केले जातात आणि त्यातून प्ल्युटोनियमची निर्मिती होते. अणूइंधनाची ही नवनिर्मिती खर्च झालेल्या इंधनापेक्षा जास्त असल्यास त्या रिअॅक्टरला 'ब्रीडर' असे म्हणतात. सुरुवातीच्या काळात ही कल्पना फारच आकर्षक वाटली होती आणि जवळजवळ सर्व प्रगत देशांनी असे प्रायोजिक रिअॅक्टर बनवले होते. पण यासाठी येणारा खर्च आणि त्यामधून प्रत्यक्ष मिळणारे उत्पन्न यांची सांगड नीट जुळत नसल्यामुळे व्यावसायिक तत्वावर असे प्रकल्प उभे राहिले नाहीत. यातल्या तांत्रिक अडचणी दूर करणे आणि खर्च कमी करणे यासाठी सगळीकडे संशोधन चालले आहे. कदाचित आणखी दहा वीस वर्षांनंतर हे चित्र पालटलेले दिसेल.

हैड्रोजनचे अणू न्यूट्रॉन्सची गती कमी करण्यायाठी सर्वाधिक कार्यक्षम असतात, पण वायुरूप अवस्थेत ते अतीशय विरळ असल्यामुळे पुरेसे परिणामकारक नसतात. पाण्याच्या ( एच टू ओ च्या) प्रत्येक रेणूमध्ये हैड्रोजनचे दोन अणू असतात. खोलीभर हैड्रोजन वायूमध्ये जेवढे अणू असतील तेवढे बादलीभर पाण्यात असतात. या कारणाने मॉडरेटर म्हणून पाण्याचा उपयोग सर्वात जास्त रिअॅक्टर्समध्ये केला जातो. न्यूट्रॉन्सची गती कमी करत असतांना मध्येच त्यातल्या काही न्यूट्रॉन्सना पाणी खाऊन टाकते (अॅब्सॉर्ब करते). याची भरपाई करण्यासाठी समृध्द युरेनियमच वापरावे लागते. हैड्रोजनमध्ये अगदी सूक्ष्म प्रमाणात त्याचा 'ड्युटोरियम' नावाचा त्याचा जुळा भाऊ (आयसोटोप) असतो, तो कार्यक्षमतेच्या बाबतीत किंचित डावा असला तरी त्याचे न्यूट्रॉनभक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे. या कारणाने या ड्युटेरियमने युक्त असे 'जड पाणी' (हेवी वॉटर) हे सर्वोत्कृष्ट मॉडरेटर आहे. हा मॉडरेटर असला तर नैसर्गिक युरेनियमचासुध्दा इंधन म्हणून उपयोग करता येतो. साध्या पाण्यामधून हे जड पाणी वेगळे करायला खूप खर्च येत असल्यामुळे हा मॉडरेटर महाग मात्र पडतो.

साधे किंवा जड पाणी जेंव्हा मॉडरेटर म्हणून रिअॅक्टरमध्ये घातले जाते, तेंव्हा त्याच पाण्याचा कूलंट म्हणून उपयोग करणे सोयीचे असते. एका बाजूच्या नळांमधून पंपाने थंड पाणी रिअॅक्टरमध्ये सोडतात आणि ऊष्ण पाणी ( किंवा वाफ) दुस-या बाजूच्या नळामधून बाहेर पडते, तिच्यापासून वीजनिर्मिती केली जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या रिअॅक्टर्समधले पाणी 'मॉडरेटर' आणि 'कूलंट' असे दुहेरी काम करते. पण जेंव्हा मॉडरेशनसाठी ग्राफाईटचा (कार्बन) वापर होतो तेंव्हा मात्र तो घनरूप असल्यामुळे एका जागी स्थिर राहतो. 'कूलंट'च्या कामासाठी दुसरा एकादा प्रवाही पदार्थच वापरणे आवश्यक असते. काही रिअॅक्टर्समध्ये कार्बन डायॉक्साईड वायूचा उपयोग या कामासाठी करतात तर काही ठिकाणी यासाठी रिअॅक्टरमधून पाण्याचा प्रवाह सोडतात. उच्च तपमानाच्या अवस्थेत पाणी आणि ग्राफाईट यांचा संयोग होऊ शकत असल्यामुळे ते कोठेही एकमेकांना स्पर्श करणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. यातला पाण्याचा प्रवाह बंद अशा वेगळ्या नलिकांमधून वाहतो. फास्ट रिअॅक्टरमध्ये मॉडरेटरच नसतो. त्यातील ऊष्णतेचे वहन करण्यासाठी वितळलेल्या सोडियम धातूसारखा अजब कूलंट वापरावा लागतो.

न्यूट्रॉन्सना कॅप्चर करणारे 'अॅब्सॉर्बर' कंट्रोल रॉड्स या कामात खर्ची पडत नाहीत. त्यांना एकदा बनवून रिअॅक्टरमध्ये बसवले की ते आय़ुष्यभर पुरतात. या कामासाठी अनेक पदार्थ उपलब्ध आहेत. त्यांना स्टेनलेस स्टीलच्या कुप्यांमध्ये ठेऊन किंवा स्टेनलेस स्टीलमध्येच मिसळून त्याच्या दांड्यांच्या सहाय्याने वरखाली करण्याची खास यंत्रणा केली जाते. त्याशिवाय काही खास कारणांसाठी काही वेळा मॉडरेटरमध्ये विरघळणारे एकादे पॉयझन मिसळले जाते आणि त्या पाण्याचे शुध्दीकरण करतांना ते हळूहळू बाहेर काढले जाते.

फ्यूएल, मॉडरेटर आणि कूलंट यांच्यामधील विविधतेमुळे त्यांचा अनेक प्रकारे उपयोग करण्याचे असंख्य प्रयोग करण्यात आले. त्यातून जे तांत्रिक दृष्ट्या यशस्वी आणि व्यावसायिक दृष्टीने फायदेशीर ठरले असे मोजके प्रकार पुढे आले. त्यांची एक एक करून अधिक माहिती पुढील भागांमध्ये करून घेऊ.

. . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

Wednesday, May 11, 2011

अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग २


शिकागो पाईल हा पहिला मानवनिर्मित रिअॅक्टर म्हणजे एक ग्राफाइटच्या विटांचा मोठा ढिगारा होता. त्यात मध्ये मध्ये युरेनियमचे गोळे पेरून ठेवले होते. त्या ढिगाच्या मध्यभागी एक पोकळी ठेवून त्यात कॅड्मियमने मढवलेल्या सळ्या टांगून ठेवल्या होत्या आणि त्यांना वर किंवा खाली करण्याची व्यवस्था केलेली होती. या तीनही पदार्थांची संख्या तसेच त्यांचे आकार सहजपणे हवे तसे बदलता येण्याच्या दृष्टीने ही रचना अतीशय सोयिस्कर होती. त्यातला युरेनियम हा ऊर्जेचा स्त्रोत होता. त्याचा न्यूट्रॉनशी संयोग झाल्यास त्यामधून प्रचंड ऊर्जा प्रगट होते आणि त्याबरोबरच बाहेर निघालेले दोन तीन न्यूट्रॉन या ऊर्जेवर स्वार होऊन तुफान वेगाने उड्डाण करतात. त्या क्षणी त्यांचा वेग प्रकाशकिरणांच्या वेगाशी तुलना करता येण्याइतका जास्त असतो. इतके वेगवान न्यूट्रॉन युरेनियमच्या दुस-या एकाद्या अणूवर आदळले तर नक्कीच त्या अणूचे दोन तुकडे करतील असे वाटेल. त्या अॅटॉमिक रिअॅक्शनतून बाहेर पडलेले सहा सात न्यूट्रॉन पुन्हा वेगवेगळ्या अणूंचे भंजन करत जातील आणि अनेक नव्या न्यूट्रॉन्सना जन्म देतील, ते असेच काम करत जातील आणि अशा प्रकारे साठ्यामधील सर्व युरेनियमचा मोठा स्फोट होईल. अणूबाँबच्या स्फोटात साधारणपणे असे घडते, पण वीजनिर्मितीसाठी आपल्याला थोडी थोडी ऊर्जा सतत देत राहणारा स्त्रोत हवा असतो. यासाठी त्या स्फोटांवर काटेकोर नियंत्रण ठेवता येणे अत्यंत महत्वाचे आहे.

वेगाने धडकणारे काही 'फास्ट न्यूट्रॉन्स' युरेनियमच्या अणूचे भंजन किंवा विघटन (फिशन) घडवून आणतात, पण बरेचसे न्यूट्रॉन्स त्या अणूला आपटून किंवा चाटून वेगानेच दूर चालले जातात. क्रिकेटमधल्या पेस बॉलरचा चेंडू जसा बॅट्समनच्या बॅट किंवा पॅडला लागून वेगाने सीमापार जातो तसे काहीसे या 'फास्ट न्यूट्रॉन्स' च्या बाबतीत घडते. याला 'स्कॅटर' असे म्हणतात. याचे प्रमाण फिशनच्या मानाने जास्त असते. युरेनियम आणि प्ल्युटोनियम वगळता इतर कोणत्याही पदार्थाच्या अणूला न्यूट्रॉन धडकला तर एक तर तो स्कॅटर होतो म्हणजे वेगळ्या दिशेला चालला जातो किंवा तो अणू त्या न्यूट्रॉनला 'कॅप्चर' करतो म्हणजे तो न्यूट्रॉन त्या अणूमध्ये विरून जातो. ग्राफाइटमधील कार्बन या मूलधातूचे अणू मुख्यतः न्यूट्रॉन्सना स्कॅटर करतात, पण ते करतांना त्या न्यूट्रॉनमधली थोडी ऊर्जा त्यांना मिळते. त्यामुळे न्यूट्रॉनचा वेग कमी होतो. अशा अनेक अणूंशी टक्कर झाल्यानंतर हा वेग अगदी कमी होतो (तरीसुध्दा तो एकाद्या रॉकेट किंवा सुपरसॉनिक विमानाच्या वेगाइतका असतो). या संथगती न्यूट्रॉन्सना 'थर्मल न्यूट्रॉन्स' असे नाव दिले आहे. तसेच त्यांची गती मंद करण्याच्या क्रियेला 'मॉडरेशन' असे म्हणतात. असा संथ गतीचा थर्मल न्यूट्रॉन जेंव्हा युरेनियमच्या अणूला भेटतो तेंव्हा मात्र तो त्याच्या पोटात शिरतो आणि त्याची दोन शकले करतो. अशा प्रकारे ग्राफाइटने केलेल्या मॉडरेशनमुळे युरेनियमच्या अणूंच्या भंजनाची क्रिया पुढे चालत राहण्याला मदत मिळते. कॅड्मियमचे अणू मात्र आलेल्या सगळ्या न्यूट्रॉन्सना गिळून टाकतात (कॅप्चर करतात). त्यामुळे भंजनाची क्रिया मंदावते किंवा पूर्णपणे थांबते. अशा पदार्थांना 'पॉयझन' म्हणतात

मोटार गाडीमध्ये अॅक्सेलेरेटर आणि ब्रेक्स दिलेले असतात आणि या दोघांचा उपयोग करून चालक गाडीवर नियंत्रण ठेवतो. त्याच प्रमाणे मॉडरेटर आणि पॉयझन यांच्या सहाय्याने रिअॅक्टरवर नियंत्रण ठेवले जाते. शिकागो पाइलमध्ये ग्राफाइट या मॉडरेटरच्या हजारो विटा ठेवल्या होत्या. रिअॅक्टर सुरू करायच्या आधी त्यांची संख्या कमी जास्त करणे शक्य होते, पण त्यात अॅटॉमिक रिअॅक्शन चालू झाल्यानंतर ती चालली असतांना त्यात बदल करणे शक्य नसते. कॅड्मियम रॉड्सना कमी अधिक प्रमाणात खाली वर करणे त्या मानाने खूपच सोपे असते. या कारणांमुळे पाइल (रिअॅक्टर)ची रचना करतांना त्यात गरजेपेक्षा जास्त युरेनियम आणि ग्राफाइट ठेवले गेले, ते करण्यापूर्वी कॅड्मियमचे रॉड पूर्णपणे आत ठेवले होते. न्यूट्रॉन्सची लहान प्रमाणावर निर्मिती करणारा एक 'सोर्स' पाइलच्या आतमध्ये सरकवताच त्यामधून न्यूट्रॉन्स बाहेर पडू लागले. चूल पेटवण्यासाठी आधी त्यात कागद घालून तो काडेपेटीने पेटवतात तशा प्रकारे या सोर्सचा उपयोग सुरुवात करण्यासाठी केला. रिअॅक्टरमधले कॅड्मियम रॉड अनेक न्यूट्रॉन्सना गिळंकृत करत असल्यामुळे सुरुवातीला फिशन चेन रिअॅक्शन टिकत नव्हती. हे रॉड हळूहळू वर नेत गेल्यानंतर त्यांचा प्रभाव कमी होत गेला आणि असा क्षण आला की ही भंजनांची साखळी पुढे आपल्या आप चालत राहिली. याला 'क्रिटिकॅलिटी' असे म्हणतात. त्यानंतर कॅड्मियम रॉड आणखी वर उचलले असते तर रिअॅक्टर 'सुपरक्रिटिकल' झाला असता म्हणजे भंजनांची संख्या वेगाने वाढत गेली असती आणि त्यातून बाहेर पडणा-या ऊष्णतेची तीव्रता वाढत गेली असती. कॅड्मियम रॉड खाली सोडले असते तर रिअॅक्टर 'सबक्रिटिकल' झाला असता म्हणजे भंजनांची संख्या वेगाने कमी होत जाऊन ती थांबली असती. या पहिल्या यशस्वी प्रयोगाला आता साठ वर्षे होत आली असली तरी आजसुध्दा जगातला प्रत्येक रिअॅक्टर अशाच प्रकारे सुरू केला जातो. आता हे कंट्रोल रॉड्स हाताने ओढत नाहीत, त्यासाठी यांत्रिक व्यवस्था असते एवढाच बदल त्यात झाला आहे.

शिकागो पाइल रचली आणि लगेच ती यशस्वी झाली असे मात्र झाले नव्हते. कोणत्याही वैज्ञानिक प्रयोगात अशी शक्यता जवळ जवळ नसतेच. त्या काळात तर युरेनियम, कार्बन, कॅड्मियम वगैरेंचे गुणधर्मसुध्दा हळूहळू समजत होते. त्यामुळे ठाऊक असलेल्या आणि प्रयोगामधून मिळालेल्या माहितीचा उपयोग करून घेत टप्प्याटप्प्याने हा प्रयोग आकार घेत होता. गरजेनुसार सुधारणा करता याव्या या दृष्टीनेच त्याची रचना पाइलच्या स्वरूपात केली होती. एक नाही, दोन नाही, तीस वेळा वेगवेगळ्या आकारांच्या ढिगा-यांवर अयशस्वी प्रयोग करून झाल्यानंतर केलेला हा एकतीसावा प्रयोग होता. तो य़शस्वी झाला आणि ऊर्जेच्या निर्मितीच्या क्षेत्रात एक नवे दालन उघडले.

'फ्यूएल' (इंधन), 'मॉडरेटर' आणि 'पॉयझन' यांची निरनिराळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रमाणात रचना करून अनेक प्रकारचे रिअॅक्टर्स बनवण्याचे प्रयोग सुरू झाले. अत्यंत गुप्तता बाळगली गेली असली तरी हे विज्ञान आणि तंत्रज्ञान जगभरातील अनेक देशांनी विकसित आणि आत्मसात केले. त्यात अमेरिकेने पुढाकार घेतला असला तरी सोव्हिएट युनियन, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा यासारखी राष्ट्रेसुध्दा या दिशेने प्रगतीपथावर होतीच. ग्राफाइटप्रमाणे पाणी आणि जड पाणी यांचा उपयोग मॉडरेशनसाठी करता येतो. त्यासाठी आवश्यक अशा आकाराचे पात्र (रिअॅक्टर व्हेसल) बवनण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले. तसेच नियंत्रण करण्यासाठी स्वयंचालित यंत्रांच्या सहाय्याने चालणारे कंट्रोल रॉड्स तयार केले गेले. अणूंच्या भंजनातून निघालेल्या ऊष्णतेपासून वीज तयार करायची झाल्यास तिला रिअॅक्टरमधून बाहेर नेण्याची व्यवस्था करायला हवी. त्यासाठी 'कूलंट' ची आवश्यकता असते. पाणी, कार्बन डाय ऑक्साइड वायू, वितळलेला सोडियम धातू अशा अनेक विकल्पांचा त्यासाठी विचार केला जाऊ लागला आणि त्यांवर प्रयोग केले गेले. अशा असंख्य गोष्टींपासून त्या विषयीच्या तंत्रज्ञानाचीच एक वेगळी शाखा तयार झाली असे म्हणता येईल.

१९४२ च्या अखेरीस शिकागो पाइल १ हा पहिला रिअॅक्टरचा यशस्वी प्रयोग करून दाखवला गेल्यानंतर सुमारे नऊ वर्षांनी म्हणजे १९५१ च्या अखेरीस अमेरिकेमधीलच इडाहो या गावी स्थापन केलेल्या प्रायोगिक रिअॅक्टरमध्ये त्यामधून निघालेल्या ऊष्णतेपासून पहिल्यांदा विजेची निर्मिती झाली. ती होती फक्त १०० किलोवॉट! त्यावर त्या प्रयोगशाळेमधले काही दिवे पेटवले गेले होते. त्यानंतर लवकरच म्हणजे १९५४ साली सोव्हिएट युनियन (रशीया) मधील ओब्निस्क या गावी अणूशक्तीपासून ५ मेगावॉट इतकी वीज निर्माण करून ती ग्रिडला म्हणजेच विजेच्या जाळ्याला दिली गेली आणि घरोघरी तिचा वापर होऊ लागला.

. . . . . . . . . . . . (क्रमशः)

Sunday, May 01, 2011

अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग १



एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस विजेचे उत्पादन आणि पुरवठा करण्याचा उद्योग व्यावसायिक तत्वावर सुरू झाला होता. त्यात मुख्यतः जलविद्युत (हैड्रो) आणि औष्णिक (थर्मल) वीजकेंद्रे होती. ज्या ठिकाणी नदीला धरण बांधून तिचे पाणी साठवून ठेवणे शक्य असेल अशा जागी धरण बांधतात, त्याच्या जलाशयातल्या पाण्याचा प्रवाह वळवून तो टर्बाइन नावाच्या यंत्रांमधून नेला जातो आणि त्या प्रवाहामुळे त्या यंत्रांच्या गोल फिरत असलेल्या चक्राच्या दांड्याला जोडलेल्या जनरेटरमध्ये विजेची निर्मिती होते. भूगर्भातील कोळसा किंवा तेल, वायू वगैरे इंधने औष्णिक केंद्रांमध्ये जाळून त्या ऊष्णतेच्या उपयोगातून पाण्याची वाफ केली जाते आणि त्या वाफेच्या सहाय्याने वेगळ्या प्रकारच्या टर्बाईन यंत्रांची चक्रे फिरवली जातात. शून्यातून ऊर्जा निर्माण करणे ही गोष्ट वैज्ञानिक दृष्ट्या केवळ अशक्य असल्यामुळे निसर्गातच पण वेगळ्या स्वरूपात उपलब्ध असलेल्या ऊर्जेचे विजेमध्ये रूपांतर करण्याचे काम ही केंद्रे करतात. ऊन, वारा, समुद्राच्या लाटा यासारख्या ऊर्जेच्या इतर नैसर्गिक स्त्रोतांचा उपयोग वीजनिर्मितीच्या कामासाठी करण्याचे प्रयत्नसुध्दा पूर्वीपासून केले जात आहेत, आता त्यांना अधिक प्राधान्य मिळाले आहे, पण आपल्या आवश्यकता भागवण्यासाठी पुरेशी वीज त्यांच्यापासून तयार करता येण्याची शक्यता मात्र अजून दृष्टीपथात आलेली नाही.

अणूपासून प्रचंड प्रमाणात ऊर्जा मिळण्याची शक्यता दिसू लागताच या बाबतीतले सर्व संशोधनकार्य अत्यंत गुप्तपणे केले जाऊ लागले. त्या सुमाराला दुसरे महायुध्द भडकलेले असल्यामुळे या ऊर्जेचा सर्वात पहिला जाहीर उपयोग मात्र हिरोशिमा आणि नागासाकी या जपानमधील शहरांचा पुरता विध्वंस करण्यासाठीच केला गेला. त्यामुळे अणूशक्ती ही एक केवळ महाभयानक आणि विनाशकारी अशा प्रकारची शक्ती आहे असा समज रूढ झाला आणि हा गैरसमज आजपर्यंत टिकून राहिला आहे, किंबहुना सध्या त्याला अधिक खतपाणी घातले जात आहे.

अणूऊर्जेवर अंकुश ठेवण्याचे प्रयोग अॅटमबाँबच्या अनियंत्रित अशा विस्फोटाच्या आधीपासून केले जात होते. १९३२ साली न्यूट्रॉनचा शोध लागला, न्यूट्रॉनमुळे होऊ शकणा-या युरेनियमच्या भंजनाची क्रिया १९३८ साली समजली, त्यावरून १९३९ मध्ये न्यूक्लियर चेन रिअॅक्शनची कल्पना मांडली गेली आणि १९४२ मध्ये ती क्रिया प्रत्यक्षात घडवून आणणारा पहिला रिअॅक्टर कार्यान्वितसुध्दा झाला. या सर्व घटना निरनिराळ्या देशांमध्ये घडल्या होत्या यावरून हे काम किती तातडीने आणि एकाच काळात अनेक देशांमध्ये केले जात होते याची कल्पना येईल. अणूऊर्जेवर संपूर्णपणे आणि खात्रीपूर्वक असे नियंत्रण करणारी यंत्रणा तयार झाल्यामुळेच हा रिअॅक्टर बनवता आला होता. मात्र हे सगळे काम गुप्तपणे चालले होते. बाहेरच्या जगाला त्याचा सुगावा लागू दिला नव्हता.

अॅटम बाँबच्या आधी अॅटॉमिक रिअॅक्टर तयार झाला म्हणजे नेमके काय झाले? "या दोन्हीमध्ये अगदी केसाएवढा सूक्ष्म फरक असतो, रिअॅक्टरचे रूपांतर कोणत्याही क्षणी बाँबमध्ये होऊ शकते." अशी (गैर)समजूत अनेक उच्चशिक्षित लोकांची सुध्दा असणे शक्य आहे. सर्वसामान्य लोकांच्या मनात दोन्हीबद्दल तेवढीच भीती असते. या बाबतीत बाळगण्यात येणा-या कमालीच्या गोपनीयतेमुळे तसे झाल्यास आश्चर्य नाही, पण सत्यपरिस्थिती वेगळी असते. निदान समाजाचे नेतृत्व करणारे लोकनेते आणि वर्तमानपत्रांचे संपादक या मंडळींनी अशा प्रकारची भन्नाट विधाने करण्याआधी त्यासंबंधी थोडा अभ्यास केला तर ते समाजाच्या दृष्टीने बरे होईल.

सोप्या उदाहरणाने सांगायचे झाले तर नवरात्रामध्ये नऊ दिवस देवघरात अखंड तेवत राहणारी समई आणि दिवाळीच्या दिवशी (रात्री) उडवलेला सुतळी बाँब यात जेवढा फरक असतो तेवढाच फरक अॅटॉमिक रिअॅक्टर आणि अॅटम बाँब यांच्या रचनेमध्ये असतो. सुतळी बाँबच्या वातीला बत्ती दिली की ती आतपर्यंत जळत जाते, आत ठेवलेल्या स्फोटक दारूचे अत्यंत वेगाने ज्वलन होऊन त्यातून जी ऊर्जा बाहेर पडते ती तप्त वायूंच्या दाबाच्या रूपात बाँबच्या कवचाच्या आतमध्येच साठत जाते, तसेच बाँब बनवतांना स्फोटक द्रव्यांना सर्व बाजूने गुंडाळलेल्या त्याच्या आवरणाला आतून जाळत जाऊन त्याला कमकुवत बनवत जाते. हे सगळे क्षणार्धात घडत असतांना अंतर्गत दाब सहन न झाल्यामुळे ते कवच अनेक बाजूंनी फाटते आणि त्याच्या चिंधड्या उडवून आतील सारी साठलेली ऊर्जा एकाच वेळी बाहेर पडल्यामुळे त्याचा मोठा स्फोट होतो. या उलट देवघरातील समई त्यात तेल असेपर्यंत मंद उजेड देत राहते. त्या तेलामधील एक एक सूक्ष्म थेंब वातीमधून हळूहळू ज्योतीत जातो आणि जळत राहतो. समईमध्ये असलेल्या सगळ्या तेलामधील सर्व राखीव ऊर्जेचा एकदम स्फोट होण्याची शक्यता नसते. रिअॅक्टरचे रूपांतर बाँबमध्ये होण्याची शक्यता यापेक्षा कमी असते, किंबहुना ते कदापि शक्य होऊ नये यासाठी खास काळजी त्याच्या रचनेत अनेक प्रकारांनी घेतलेली असते. एकाद्या माथेफिरू अतिरेक्याने ठरवून तसे करायचे ठरवले तरीसुध्दा ते घडण्याची शक्यता नसते.

आता अॅटॉमिक रीअॅक्टरचा थोडासा पूर्वेतिहास पाहू. १९३२ साली न्यूट्रॉनचा शोध लागला म्हणजे नेमके काय झाले? ते तर प्रत्येक द्रव्याच्या अणूरेणूंमध्ये आधीपासून अस्तित्वात होतेच. त्या वर्षी केलेल्या प्रयोगांमध्ये त्यांना पहिल्यांदा अणूच्या गर्भामधून बाहेर काढून दाखवले गेले. याचा अर्थ भुईमुगाच्या शेंगातले दाणे काढून डब्यात भरून ठेवावेत तसे कोणी न्यूट्रॉन्सना बाटलीत भरून जगाला दाखवले असा होत नाही. एका विशिष्ट प्रक्रियेमध्ये क्षणभरासाठी न्यूट्रॉन्स एका अणूमधून बाहेर पडतात आणि लगेच ते अनंतात विलीन होऊन जातात. ती क्रिया घडवून आणणे आणि त्या क्षणापुरते त्या न्यूट्रॉनचे वेगळे अस्तित्व ओळखणे या गोष्टी एका शास्त्रज्ञाने साध्य करून दाखवल्या. टेलीव्हिजन आणि इंटरनेट यासारखी प्रभावी माध्यमे नसतांनाच्या त्या काळातसुध्दा ही बातमी जगभरातील वैज्ञानिकांमध्ये पसरली. त्यानुसार न्यूट्रॉनचा झोत तयार करून त्याचे विविध पदार्थांवर होणारे परिणाम यावर सगळीकडे संशोधन सुरू झाले. इतर सर्व पदार्थ या सुट्या न्यूट्रॉन्सना लगेच गिळंकृत करून टाकत असतांना युरेनियम या धातूमधून मात्र दुप्पट तिप्पट संख्येने जास्तच न्यूट्रॉन्स बाहेर पडतात असे धक्कादायक निरीक्षण १९३८ साली प्रसिध्द झाले. या क्रियेला फिशन (भंजन) असे नाव दिले गेले. ही क्रिया सातत्याने घडवून आणत राहणे शक्य होत असेल तर त्या क्रियांची एक वेगाने वाढत जाणारी साखळी (चेन रिअॅक्शन) बनवता येईल आणि त्यातून निर्माण होणा-या न्यूट्रॉन्सची संख्या अनंतपटीने वाढवत नेता येईल असा तर्क केला जाऊ लागला. त्या वेळी हा फक्त तर्क होता, प्रत्यक्ष कृती करून तो पडताळून पाहणे आवश्यक होते. त्यासाठी नक्की काय करायला हवे हा सुध्दा एक मोठा प्रश्न होता. अनेक शास्त्रज्ञ त्यासाठी आपली बुध्दी पणाला लावत होते.

ते काम करण्यासाठी अनेक प्रयत्न करून झाल्यानंतर १९४२ साली पहिला यशस्वी रिअॅक्टर बनवला गेला त्याची चित्तरकथा मजेदार आहे. ज्या प्रयोगशाळेत हा उभारायचे ठरले होते त्या ठिकाणी मजूरांचा संप सुरू झाला. शास्त्रज्ञ आणि सरकारचे संरक्षण खाते यांना तर हा प्रयोग करण्याची घाई झाली होती. शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये एक ओस पडलेली जुनी इमारत होती. तिथल्या एका खोलीत ग्राफाइटचे खूप ठोकळे आणि युरेनियमच्या चकत्या (पेलेट्स) यांची विशिष्ट प्रकारे रचना केली गेली. त्या काळी 'रिअॅक्टर' या शब्दाचा उपयोग सुरू झाला नव्हता. या रचनेला एक 'ढीग (पाईल)' असे साधे नाव दिले. न्यूट्रॉन्सचे शोषण करण्यासाठी कॅड्मियमचा मुलामा दिलेल्या काही सळ्या त्या पाइलच्या आतबाहेर सरकवता येतील अशी व्यवस्था केली होती. त्यांना हळूहळू पाईलच्या बाहेर काढले (वर उचलले) की चेन रिअॅक्शन सुरू होऊन न्यूट्रॉन्सची संख्या वाढेल आणि त्यांना खाली सोडून आत ढकलले की चेन रिअॅक्शन बंद पडून न्यूट्रॉन्सची संख्या रोडावेल अशी अपेक्षा होती. न्यूट्रॉन्सची आणि रेडिएशनची अत्यंत सूक्ष्म गणना करणारी अचूक अशी उपकरणेच पाईलच्या आत चाललेल्या किंवा बंद पडलेल्या रिअॅक्शनची माहिती पुरवणार होती. या न्यूट्रॉन्सची अपेक्षित गणती अगदी नगण्य असल्यामुळे त्यांच्यापासून रेडिएशनचे दुष्परिणाम होण्याची भीती नव्हती तसेच यातून निर्माण होणारी क्षीण ऊष्णता वाहून नेण्यासाठी कसलीही व्यवस्था केलेली नव्हती. प्रयोगाचे संचालक महान शास्त्रज्ञ एन्रिको फर्मी यांना हा प्रयोग हाताबाहेर जाणारच नाही याबद्दल एवढी जबरदस्त खात्री होती की त्यांनी कसल्याही प्रकारचे शील्डिंग सुध्दा बसवले नव्हते. आज कोणीही अशा प्रयोगाला सुध्दा अनुमती देणार नाही, पण युध्दपातळीवर चाललेल्या संशोधनाच्या त्या टप्प्यावर अशा रीतीने जगातला पहिला वहिला 'मानवनिर्मित रिअॅक्टर' तयार झाल्याची अधिकृत नोंद झाली.

आजकालच्या अत्यंत गुंतागुंतीच्या रीअॅक्टर्सशी तुलना करता हा प्रयोग पहायला गेल्यास फारच साधा होता. त्या प्रॉजेक्टवर काम करणा-या शास्त्रज्ञांनी आणि त्यांच्या सहाय्यकांनीच त्यातले ग्राफाईटचे ब्लॉक्स आणि युरेनियमचे पेलेट्स एका लाकडी सांगाड्यामध्ये हाताने रचले आणि त्यात आपले अंग आणि कपडे मळवून घेतले. नियंत्रण करणारे कॅडमियमकोटेड रॉड्स दोरीला टांगले होते आणि त्यांना हाताने ओढून वरखाली करण्यासाठी तीन निधड्या छातीचे शिलेदार पाईलच्या माथ्यावर उभे होते. प्रयोगात काही गंभीर स्वरूपाची गफलत झाली असतीच तर ते थेट आसमानात गेले असते. याशिवाय एक खूप शक्तीशाली आणि वजनदार वेगळा रॉड टांगून ठेवला होता आणि संदेश मिळाला की तत्क्षणी त्याच्या दोरीवर घाव घालून तिला तोडण्याच्या तयारीने एक जवान हातात कु-हाड घेऊन त्याच्या शेजारी सज्ज उभा होता. त्याला SCRAM—the safety control rod ax-man असे नाव दिले होते. पाईलमधल्या न्यूक्लियर रीअॅक्शन प्रमाणाबाहेर जाऊ लागल्या असल्याची शंका आल्यास त्या माणसाने कु-हाडीचा घाव घालून ती दोरी तोडायची आणि तो रॉड पाईलमध्ये खाली पडला की रीअॅक्शन नक्की बंद पडणारच अशी व्यवस्था होती. गरज पडताच रिअॅक्टरला आपोआप बंद पाडण्याची स्वयंचलित 'ट्रिप' किंवा 'शट डाऊन सिस्टम' प्रत्येक रिअॅक्टरमध्ये असतेच. अमेरिकेत त्यांना आजही 'स्क्रॅम' असे म्हणतात.

या प्रयोगासाठीसुध्दा अफाट खर्च आला होता. त्यासाठी वापरले गेलेले तीनचारशे टन ग्राफाईट आणि कित्येक टन युरेनियम यांचीच किंमत त्याकाळी कोटींच्या घरात, म्हणजे आजच्या काळातील अब्जावधी रुपये एवढी होती. आणि त्यातून जेवढी ऊष्णता बाहेर पडत होती त्यावर एक कप चहासुध्दा झाला नसता. पण अणूशक्तीचा उपयोग करून त्यातून भरपूर प्रमाणात ऊष्णता निर्माण करणे हा या प्रयोगाचा उद्देश नव्हताच. भंजनाची (फिशन) एक अखंड साखळी तयार करता येईल अशी जी कल्पना पुढे आली होती, त्या कल्पनेचा पुरावा प्रत्यक्ष प्रमाणातून मिळवणे हा या प्रयोगाचा एकमेव उद्देश होता. एकदा ते सिध्द झाले की पुढे जाण्याचा मार्ग प्रशस्त होणार होता. जवळ जवळ अर्धा तास या पाईलशी हो नाही चा खेळ खेळून घेतल्यानंतर आपल्याला हवे तेंव्हा भंजनक्रियेची साखळी (न्यूक्लियर चेन रिअॅक्शन) सुरू करता येते, अपेक्षेनुसार ती सुरू होते, त्यानंतर ती आपोआप चालत राहते आणि नको वाटली की तिला लगेच बंदही करता येते याची शास्त्रज्ञांना पूर्ण खात्री पटली. त्यांच्या मनातून तसे वाटत असले तरी त्यात कसलाही अनपेक्षित गोंधळ होणार नाही याचा प्रत्यक्ष पुरावा हवा होता. तो मिळाल्यानंतर त्यांनी हा पाईल कायमचा बंद करून टाकला, दोन तीन महिन्यातच त्यातले सारे सामान जसे रचले होते तसेच ते उतरवले आणि नव्या जागी पुन्हा व्यवस्थितपणे रचून आपले पुढील प्रयोग सुरू केले.

मानवाच्या भवितव्यावर एवढा मोठा प्रभाव ज्याने पडला अशा या ऐतिहासिक प्रयोगाबद्दल त्या काळात मात्र कमालीची गुप्तता बाळगली होती. त्यात मिळालेल्या माहितीला तर कणभर देखील प्रसिध्दी दिली गेली नाहीच, या प्रयोगावर काम करणा-या शास्त्रज्ञांच्या बायकांनादेखील आणखी काही वर्षे उलटून जाईपर्यंत असा प्रयोग केला गेल्याबद्दल सुध्दा अवाक्षर समजले नव्हते. या शास्त्रज्ञांनी अनेक दिवसरात्र काम करून केलेल्या अथक परिश्रमानंतर मिळालेल्या यशाने खूष होऊन श्रमपरिहार करण्यासाठी एक लहानशी पार्टी केली. त्या पार्टीत कोणीतरी डॉ.फर्मी यांचे अभिनंदन करताच ते कशाबद्दल असे त्यांच्या पत्नीने त्यांना विचारले. आयत्या वेळी एक थाप मारून त्या सहका-याने ती वेळ निभावून नेली, पण त्यानंतर त्या थापेशी सुसंगत अशी उडवाउडवी त्यांना करत रहावी लागली.

. . . . . . . . . . . (क्रमशः)

Thursday, April 28, 2011

तेथे कर माझे जुळती - ७ (उत्तरार्ध) - पं.शिवानंद पाटील



हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातले कलाकार आपले उस्ताद, गुरू किंवा एकाद्या बुजुर्ग व्यक्तीच्या नावाचा उच्चार करतांना एका हाताने आपला एक कान पकडतात. त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करणे हा या परंपरागत प्रथेमागील उद्देश असतो. "माझ्या गाण्यात जेवढे चांगले दिसेल ते सारे माझ्या गुरूने मला शिकवले आहे आणि चुकीचे किंवा खराब असे सगळे माझे स्वतःचे आहे." असे बरेचसे कलाकार मंचावरून म्हणतात, पण त्यांच्या एरवीच्या बोलण्यातल्या आत्मप्रौढीवरून त्यांचा मानभावीपणा दिसून येतो. शिवानंद पाटील मात्र जेवढ्या उत्कट भावनेने त्यांच्या गुरूंबद्दल स्टेजवरून बोलत असत, तेवढाच आदरभाव त्यांच्या खाजगीतल्या बोलण्यातसुध्दा प्रकट होत असे.

त्यांचे पूर्वीचे गुरू इचलकरंजीचे पं. दत्तात्रेय विष्णू काणे (काणेबुवा) यांच्या वयाची ७५ वर्षे झाल्याचा महोत्सव त्यानिमित्य एक मोठा संगीताचा कार्यक्रम आयोजित करून शिवानंदांनी दादरला घडवून आणला. सांगली कोल्हापूरकडे रहात असलेल्या काणेबुवांच्या शिष्यपरिवाराचा मेळावा त्या ठिकाणी भरवला आणि त्यांचे गायन मुंबईकरांना ऐकवले. पं.काणेबुवांबद्दल आपल्या मनातला आदर शिवानंदांनी या शब्दात सांगितला, "अधिकार माझा काही न पाहता पायी ठेवले । पायी ठेविले गुरूने मज धन्य केले ।।"

पं.डॉ.बसवराज राजगुरू यांचा स्मृतीदिन शिवराज आणि योजना पाटील १९९२-९३ पासून दरवर्षी साजरा करत आले आहेत. त्या निमित्याने दरवर्षी कर्नाटकातील एकाद्या मोठ्या गायक कलाकाराच्या गायनाचा कार्यक्रम ठेवला जात आला आहे. शिवानंद स्वतःसुध्दा आपल्या गुरूला तन्मयतेने आदरांजली वाहत. तनमनधन समर्पण करण्याचा भाव त्यात दिसून येत असे. स्व.गंगूबाई हनगल यांच्या वयाचा विचार करून त्यांना प्रवासाची दगदग होऊ नये या विचाराने एकदा हा कार्यक्रम बेळगावात ठेवला गेला. आपली कन्या कृष्णाबाई यांच्याबरोबर गंगूबाई त्या समारंभाला आल्या आणि गायल्यादेखील. जवळच्या नातेवाइकाच्या आगमनाने जो आनंद वाटेल तसा आनंद आणि आपुलकी या लोकांच्या भेटण्यामध्ये मला दिसली. बाहेरगावाहून बेळगावला गेलेल्या प्रत्यकाची ते स्वतः खूप आपुलकीने विचारपूस करत होते आणि त्यांची कसलीही गैरसोय होणार नाही याची खातरजमा करून घेत होते.

शिवानंदांची आणि माझी ओळख झाली त्या वेळी ते रेल्वेमध्ये नोकरी करत होते. नोकरी सांभाळून संगीताची सेवा करीत त्यांनी त्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले होते. संगीतासाठी जास्त वेळ मिळावा म्हणून पुढे त्यांनी नोकरी सोडली आणि पूर्णवेळ संगीताला वाहून घेतले. त्या क्षेत्रात त्यांची प्रगती होत गेली. संगीताच्या क्षेत्रात सर्वाधिक मानाचे स्थान लाभलेल्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवासह इतरही अनेक मोठ्या संमेलनांमध्ये त्यांचे गायन झाले. संगीत रंगभूमीवरही त्यांनी काही नाटकातून भूमिका केल्या. शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत या दोन्ही क्षेत्रांमधील बक्षिसे आणि मानसन्मान त्यांना मिळाले. त्यांच्या गायनाच्या कॅसेट्स, सीडी निघाल्या. पं.दीनानाथ मंगेशकरांच्या नावाने दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार त्यांना मिळाला.

हे सगळे असले तरी त्यांना अपेक्षित होते किंवा व्हायला हवे होते तेवढे त्यांचे कार्यक्रम प्रत्यक्षात होत नव्हते. महागाईबरोबर वाढत जाणारे सर्वच खर्च आणि पैसे खर्च करून शास्त्रीय संगीत ऐकायला येणा-या श्रोत्यांमध्ये होत असलेली घट यांचे गणित जुळत नव्हते. कमी मानधन घेणे परवडत नाही आणि जास्त उत्पन्न देणारे कार्यक्रम होतच नाहीत असे होऊ लागले. संगीताच्या शिकवण्या करून त्यातून कमाई करायचा त्यांनी प्रयत्न केला, पण कलाकार आणि शिक्षक या दोन गोष्टींसाठी वेगळे गुण लागतात. उत्कृष्ट कलाकार आपली कला तितक्याच चांगल्या शिष्यालाच शिकवू शकतो, सामान्य दर्जाच्या विद्यार्थ्याकडून त्याच त्या प्राथमिक स्वरूपाच्या गोष्टी घटवून घेणे त्याला आवडत नाही. त्याच प्रमाणे उत्कृष्ट शिक्षकाला स्वतः मैफिल गाजवता येतेच असे नाही, त्यासाठी प्रतिभेचे देणे अंगात असावे लागते. काही अद्वितीय कलाकारांमध्ये दोन्ही प्रकारचे कौशल्य असते, त्यांचा मोठा शिष्यपरिवार तयार होते. शिवानंदांच्या बाबतीत ते झाले नाही. कदाचित त्यांना होतकरू आणि कष्टाळू असा शिष्य लाभला नसावा. हेसुध्दा एक प्रकारचे नशीबच असते.

मराठी रंगभूमीवर एका काळी संगीत नाटकांनी राज्य गाजवले असले तरी आता त्याचे दिवस राहिले नाहीत. काही चांगल्या नाटकात शिवानंदांनी भूमिका केल्या, पण त्याचे जास्त प्रयोग झाले नाहीत. पं.जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबध्द करून अजरामर केलेली बहुतेक नाट्यगीते मी मूळच्या नाट्यकलावंतांकडून ऐकली आहेत, त्यातील काही गीते अभिषेकीबुवांच्या तोंडूनसुध्दा एकली आहेत. त्यातली काही गाणी, विशेषतः कट्यार कालजात घुसली या नाटकातील गाणी शिवानंद गात असे तेंव्हा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळत असे. काही वर्षांपूर्वी साक्षात लता मंगेशकर आणि पं.हृदयनाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली शतजन्म शोधतांना हे नवे संगीत नाटक रंगभूमीवर आले होते. शिवानंदांनी त्यात प्रमुख भूमिका केली होती. ते नाटक चांगले असूनसुध्दा दुर्दैवाने व्यावसायिक दृष्ट्या अयशस्वी ठरले.

संगीतक्षेत्रातील कलाकारांमध्ये अनुकरणक्षमता आणि नवनिर्मितीक्षमता असे दोन निरनिराळे गुण आढळतात. शिवानंदांकडे दोन्ही होते, पण पहिला जरा जास्त प्रभावी असावा. गुरूंकडून शिकलेली गीते आणि बंदिशी ते स्वतःच्या गानकौशल्याने बहारदार फुलवून त्याना खूप उंच पातळीवर नेत असत. अनेक अभंगांना त्यांनी स्वतः चाली लावल्या. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्य ते अभंगवाणी किंवा भक्तीगीतांचा कार्यक्रम सादर करत असत. त्या वेळी ऐकतांना त्यांनी लावलेल्या चालीसुध्दा गोड वाटत असत. पण अजित कडकडे किंवा सुरेश वाडकर यांच्या गाण्याच्या ध्वनिमुद्रिका जशा घरोघरी दिसतात तशा शिवानंदांच्या दिसत नाहीत.

अपेक्षेप्रमाणे यश मिळत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली नसली तरी त्यांच्या संवेदनशील मनाला ती लागली असणार. दोन वर्षांपूर्वी गंगूबाई निवर्तल्या त्या वेळी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी शिवानंद हुबळीला गेले असतांना त्यांना एक अपघात झाला आणि त्यात अंतर्गत इजा झाल्या. कदाचित त्या वेळी त्यांचे गंभीर स्वरूप लक्षात आले नसावे, पण कालांतराने त्यापासून त्रास होऊ लागला. तो जास्त वाढला की त्यावर उपचार आणि विश्रांती घ्यायची आणि कमी झाला की पुन्हा जोमाने कामाला लागायचे असे चालले होते. गेल्या वर्षी बसवराज राजगुरू स्मृतीदिन त्यांनी पुण्याला साजरा केला त्यावेळी त्यात गायनसुध्दा केले. त्या कार्यक्रमाला आम्ही हजर होतो, पण त्यांना झालेल्या अपघाताची आणि त्यातून उद्भवलेल्या आजाराची आम्हाला त्यावेळी माहितीसुध्दा मिळाली नव्हती. पण वर्षअखेर तो आजार बळावला आणि पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवले होते. तिथून ते बरे होऊन परत आले असे ऐकले होते.
एप्रिलमध्ये चेंबूरला होणार असलेल्या अल्लादियाखाँ संगीत महोत्सवात यावर्षी त्यांचे गायनसुध्दा ठेवले होते. पण २१ तारखेला झालेल्या उद्घाटनाच्या दिवशीच ते रहीत झाल्याचे समजले. त्याबद्दल जास्त तपशील कळण्याच्या आधीच त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतल्याची दुःखद बातमी येऊन थडकली. ते मरोळला रहायला गेल्यापासून नेहमी आम्हाला त्यांच्या नव्या घरी येऊन जाण्याचे आमंत्रण देत होते आणि आम्हीसुध्दा जरूर येऊ असे म्हणत आलो होतो, पण ते काही जमले नाही आणि प्रत्यक्षात गेलो तेंव्हा साश्रु नयनांनी त्यांच्या तसबिरीपुढे हात जोडावे लागले.

Tuesday, April 26, 2011

तेथे कर माझे जुळती - ७ (पूर्वार्ध) - पं.शिवानंद पाटील



या लेखमालिकेमधील पहिली दोन पुष्पे मी दोन जगद्वंद्य प्रख्यात व्यक्तींना समर्पित केली होती. त्यांच्या सहवासाचे अगदी मोजके क्षण मला प्राप्त झाले होते पण ते माझ्या मनावर कायमचा ठसा उमटवून गेले होते. त्यानंतर फारशी प्रसिध्दी न मिळालेल्या पण माझ्या जीवनावर परिणाम करणा-या माझ्या जवळच्या परिचयातल्या तीन व्यक्तींविषयी मी लिहिले होते. जिला बरीच प्रसिध्दीही मिळाली आणि बरीच वर्षे थोडे जवळून पहाण्याची संधी मला मिळाली अशा एका खास व्यक्तीबद्दल मी आज या भागात लिहिणार आहे. त्यांचे नाव पं.शिवानंद पाटील. खरे तर त्यांच्याबद्दल चांगली तयारी करून खूप सविस्तरपणे लिहावे अशी माझी इच्छा होती. त्याच्याही आधी त्यांना खूप मोठे होतांना पहावे असेही मला वाटत होते, पण दैवाला ते मंजूर नव्हते. त्याने अचानक घाला घालून शिवानंदांना आपल्यातून ओढून नेले. त्यामुळे आता सुन्न झालेल्या मनःस्थितीमध्ये मला त्यांच्याबद्दल सुचेल तसे लिहीत आहे.

पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी पुणे मुंबई महामार्ग झाला नव्हता. रेल्वेने पुण्याला जाण्यासाठी आम्ही दादर स्टेशनला गेलो. पावसाळ्याचे दिवस होते, त्यामुळे पोचायला थोडा उशीरच झाला. डेक्कन एक्सप्रेस सुध्दा तशी उशीरानेच निघाली होती, पण आम्ही तिकीट काढून प्लॅटफॉर्मवर पोचेपर्यंत ती चालली गेली. कोयना एक्सप्रेससाठी दोन तास थांबावे लागणार होते आणि पावसाचा जोर वाढतच असल्यामुळे तिच्या वेळेबद्दल अनिश्चितताही वाढत होती. थोड्या वेळाने बंगलोरला जाणारी उद्यान एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर आली. पुण्याला जाऊ इच्छिणारे आमच्यासारखे खूप लोक प्लॅटफॉर्मवर उभे होते. ते सगळे गाडीत शिरले म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही सुध्दा समोर आलेल्या डब्यात चढलो. त्या काळातले प्रवासी थ्री टायर स्लीपरच्या डब्यात थेट आतपर्यंत घुसून बसण्याएवढे निर्ढावले नव्हते. आम्ही लोक दोन दरवाज्यांमधल्या जागेत अंग चोरून उभे होतो. रखडत रखडत गाडी कल्याणला आली. त्या स्टेशनावर प्रवाशांचा मोठा लोंढा डब्यात घुसायच्या तयारीत असलेला पाहून आमच्या सहप्रवाशांनीच आम्हाला आतल्या बाजूला ढकलले.

तिथे बसलेल्या प्रवाशांना बाहेरची परिस्थिती दिसत होतीच. त्यातल्या एका सुस्वभावी तरुण जोडप्याने थोडे सरकून आपल्या बाकावर आमच्या मुलांना बसवून घेतले. त्या दोघांनाही आम्ही दूरदर्शनवर पाहिले होते. अलकाने त्यांना लगेच ओळखले, पण उपचार म्हणून "तुम्ही शिवानंदच ना?" असे विचारले. पं.शिवानंद पाटील आणि योजना शिवानंद यांची पहिली ओळख अशी ध्यानीमनी नसतांना निव्वळ योगायोगाने झाली. त्या दिवशी पावसामुळे रेल्वेमार्गात अनेक अडथळे आले होते, अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या, आमची गाडीसुध्दा अत्यंत कूर्मगतीने हळूहळू सरकत रात्री पुण्याला जाऊन पोचली. शिवानंद आणि योजना यांना बंगळूरूपर्यंत जायचे होते. पुण्यापर्यंत आम्हाला एकमेकांचा सहवास मिळाला आणि वेळ काढण्यासाठी आम्ही अधून मधून बोलत राहिलो.

पं.बसवराज राजगुरू, स्व. गंगूबाई हंगल, स्व.जितेंद्र अभिषेकी, पं.काणेबुवा, पं.यशवंतबुवा जोशी यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांकडे शिवानंदांनी संगीताचे शिक्षण घेतले होते. आम्ही त्या महान संगीतज्ञांना प्रत्यक्ष किंवा टीव्हीवर पाहिले होते, त्यांचे गायन ऐकले होते आणि त्यांच्याबद्दल भरपूर वाचले किंवा ऐकले असल्यामुळे त्यांची नावे सुपरिचित होती. त्यांच्या विषयी शिवानंद आणि योजना जे काही सांगतील त्याचा संदर्भ आम्हाला लागत होता आणि संवाद सुरू ठेवण्यासाठी आम्हीही त्यांच्याबद्दल एकादा शब्द बोलू शकत होतो. अलकाने ज्या गुरूंकडून मार्गदर्शन घेतले होते ते फारसे प्रसिध्द नसले तरी संगीताच्या क्षेत्रातले लोक त्यांना ओळखत असावेत. त्यांना आपण ओळखत असल्याचे शिवानंद सांगत होते. कदाचित ते खरोखरच ओळखत असतीलही किंवा कदाचित आम्हाला बरे वाटावे म्हणून ते तसे सांगत असतील. याबद्दल जास्त खोलात जाण्याची आम्हाला गरज नव्हती.

शिवानंदांच्या बोलण्यात कानडी हेल येत असल्याचे माझ्या लगेच लक्षात आले होते. त्यामुळे मी तसाच हेल काढून कानडीमध्येच त्यांचे गाव विचारले. ते माझ्या गावाच्या शेजारच्याच तालुक्यातले निघाले. म्हणजे आम्हा दोघांचे बालपण एकाच प्रदेशात आणि एकाच प्रकारच्या संस्कृतीमध्ये गेले होते. आता आम्हाला बोलायला आणखी बरेच विषय मिळाले. मात्र शिवानंदांचा जन्म होण्यापूर्वीच मी तो भाग सोडून मुंबईला आलो होतो आणि माझ्या लहानपणी मला शास्त्रीय संगीताचा गंधसुध्दा नव्हता. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात मला माहीत नसलेले काही वेगळे आले की आमच्या काळातली गोष्ट जरा वेगळी होती असे म्हणायला मी मोकळा होतो. आम्हाला कानडीत बोलतांना पाहून आमच्या अर्धांगिनींना आधी थोडे कौतुक वाटले असेल, पण त्यांना काही शंका येऊ नयेत म्हणून आम्ही आपापल्या स्टाईलच्या मराठीवर येऊन सर्वांना समजतील अशा विषयांवर बोलू लागलो. त्या अर्ध्या दिवसात आमचे धागे चांगले जुळले आणि मुंबईला परत आल्यावर एकमेकाना संपर्क करायचा असे ठरवूनच आम्ही त्यांचा निरोप घेतला.

आम्हाला मनातून पुन्हा त्यांच्याशी बोलण्याची इच्छा होतीच. पण लवकरच त्यासाठी एक कारण मिळाले. अणुशक्तीनगरच्या वसाहतीमध्ये स्वरमंडल नावाची एक सांस्कृतिक संस्था स्थापन करण्यात आमचाही खारीचा वाटा होता. त्याच्या तत्कालीन कार्यकारी मंडळावर असलेल्या मंडळींशी माझी चांगली मैत्री होती. त्यांनी कर्नाटकातल्या एका सुप्रसिध्द गवयाच्या गायनाचा कार्यक्रम ठरवला होता, पण काही अडचणींमुळे तो येणार नसल्याचे फक्त दोन तीन दिवस आधी समजले. कार्यक्रम करण्याच्या दृष्टीने बरीचशी तयारी झालेली असल्यामुळे तो रद्द करणे ही संस्थेच्या दृष्टीने नामुष्कीची आणि आर्थिक दृष्ट्या अडचणीची गोष्ट होती. आयत्या वेळी काय करावे या विचारात ती मंडळी आहेत हे समजल्यावर आम्ही पुढाकार घेतला आणि त्या दिवशी पं.शिवानंदांना वेळ आहे का याची विचारणा केली. त्यांना वेळ आहे हे समजल्यावर तडकाफडकी संयोजकांना सांगितले आणि स्वरमंडळात त्यांचा कार्यक्रम ठरूनही गेला. ते जोडपे त्यांच्या साथीदारांसह आधी आमच्या घरी आले आणि ताजेतवाने झाल्यानंतर त्यांना सभागृहाकडे नेण्याची व्यवस्था केली गेली. या भेटीत आमचा परिचय जास्तच दृढ झाला. त्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात शिवानंद अप्रतिम गायले आणि दुस-या कोणा बड्या गवयाचा कार्यक्रम आधी ठरला होता हे बहुतेक लोकांना कळलेसुध्दा नाही. ज्यांना ही गोष्ट माहीत होती त्यांनाही त्याबद्दल जरासुध्दा रुखरुख वाटायला जागाच उरली नाही. स्वरमंडळातर्फे आजवर जेवढे कार्यक्रम केले गेले आहेत त्यातल्या सर्वोत्कृष्ट परपॉर्मन्सेसमध्ये या मैफिलीची गणना होईल.

यानंतर आमचा परिचय वाढत गेला. शिवानंदांचे गायन कोठेही असो किंवा योजना प्रतिष्ठानचा कोणताही कार्यक्रम असो, त्याचे आग्रहाचे निमंत्रण आम्हाला मिळत असे आणि स्थलकालाच्या मर्यादेत त्यातल्या जितक्या कार्यक्रमाला जाणे आम्हाला शक्य असेल त्या सर्व ठिकाणी आम्ही आवर्जून जातही असू. कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी किंवा संपल्यानंतर बॅकस्टेजवर जाऊन त्यांना भेटत असू. त्यांचा चहा, फराळ आणि गप्पागोष्टींमध्ये सहभागसुध्दा घेतला. संगीताच्या तसेच इतर क्षेत्रांमधील कित्येक मोठ्या लोकांची यामुळे प्रत्यक्ष भेट घडली, त्यांचेशी हस्तांदोलन किंवा त्याना चरणस्पर्श करण्याची संधी आम्हाला मिळाली.

अमक्या रागामध्ये नसलेले कोमल गंधारचे स्वर आले किंवा असलेला तीव्र धैवत जरा कमी लागत होता अशा प्रकारचे बारकावे मला अजीबात समजत नसले तरी एकंदरीत ते गायन उत्तम, मध्यम की सुमार होते याचा थोडा अंदाज आता अनुभवावरून येतो. शिवानंदांचे जेवढे गायन मी ऐकले ते सारे उत्तम याच सदरात होते. त्यातही एकादे दिवशी मैफल चांगली रंगल्याने सर्व श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेले आणि दुस-या एकाद्या दिवशी ती तेवढी रंगली नाही असे होणारच. पण तरी त्या दिवशी सुध्दा त्यांच्या गायनाचा दर्जा उत्तमच वाटला. शिवानंदांना त्यांच्या आईवडिलांकडून संगीताचे बाळकडू मिळाले होते. उपजत गोड गळ्यावर लहानपणापासून शास्त्रीय संगीताचे संस्कार झाले, त्यांना चांगले गुरू लाभले आणि त्यांनी स्वतः भरपूर मेहनत घेऊन गुरूंनी शिकवलेले गायन आपल्यात मुरवले होते. गायनासाठी श्रोत्यांपुढे जाण्यापूर्वी ते तिथे असलेल्या वडीलधारी लोकांचे आशीर्वाद घेत, त्यांच्या आराध्यदैवताचे स्मरण करून प्रार्थना करत असत. या सगळ्यांचा फायदा होतो अशी त्यांची श्रध्दा होती, किंवा त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत असावा. शिवाय कलाकाराच्या मनातला प्रामाणिकपणा, चांगुलपणा, निष्ठा वगैरेंचे प्रतिबिंब त्याच्या कलाविष्कारात पडते असे म्हणतात. शिवानंदांच्या गायनात मला हे गुण कुठेतरी डोकावत आहेत असा भास होत असे.

Wednesday, April 13, 2011

अणूऊर्जेचा प्रताप


फुकुशिमा अणुविद्युत केंद्रासंबंधी तीन लेख आणि 'परमाणू ऊर्जेचा शोध' या माझ्या मागील लेखांमध्ये मी माझ्या ओळखीच्या शब्दांचा उपयोग केला होता. 'मोलेक्यूल' आणि 'अॅटम' या इंग्रजी शब्दांना 'अणू' आणि 'परमाणू' हे मराठी प्रतिशब्द मी दिले होते. ते चुकीचे किंवा कालबाह्य असल्याचे या लेखांवर झालेल्या चर्चेमधून समजले. 'मोलेक्यूल' आणि 'अॅटम' या इंग्रजी शब्दांना 'रेणू' आणि 'अणू' हे मराठी प्रतिशब्द आता प्रमाणभाषेत दिले जातात असे समजल्यामुळे यापुढील लेखांमध्ये मी या शब्दांचा उपयोग करणार आहे. एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस मेरी क्यूरी आणि इतर शास्त्रज्ञांनी रेडिओअॅक्टिव्हिटीचा शोध लावल्यानंतर विज्ञानाच्या पुस्तकात नवा अध्याय सुरू झाला होता. इतर अनेक पदार्थ सुध्दा रेडिओअॅक्टिव्ह असल्याचे प्रयोगातून सिध्द होत होते. त्या काळात आढळलेले हे सारे पदार्थ नैसर्गिकच होते. प्रत्येक मूलद्रव्यांमधून बाहेर पडणारे किरण वेगळ्या प्रकारचे असतात. त्या किरणांवरून त्या पदार्थाचे अस्तित्व ओळखण्याचे शास्त्र विकसित होत गेले. उत्खननात सापडलेल्या मानवनिर्मित वस्तूंच्या अवशेषांवरून त्यांचा कालखंड ठरवण्याचे साधन (कार्बन डेटिंग) या शास्त्रामुळे इतिहासकारांना मिळाले आणि खडकांमधून निघणा-या किरणांच्या अभ्यासावरून जिऑलॉजिस्ट्सना त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळू लागली. अशा प्रकारे रेडिओअॅक्टिव्हिटीचा उपयोग संशोधनासाठी होत असला तरी 'ऊर्जेचे साधन' या दृष्टीने त्याचा उपयोग होऊ शकत नव्हता. सूर्यकिरणांपासून आपल्याला प्रकाश आणि ऊष्णता या दोन प्रकारची ऊर्जा मिळते. चंद्राच्या चांदण्यामधून फक्त उजेड मिळतो, जाणवण्याइतपत ऊष्णता मिळत नाही. काळोख्या रात्री आकाशातले तारे आपल्याला दिसतात, पण त्यांच्या प्रकाशामध्ये आपल्याला स्वतःचा हातसुध्दा दिसत नाही, इतका तो उजेड क्षीण असतो. बहुतेक नैसर्गिक रेडिओअॅक्टिव्ह पदार्थांमधून बाहेर पडणारे किरण अदृष्य आणि अत्यंत क्षीण असतात. त्यांच्यामध्ये असलेल्या ऊर्जेचा रोजच्या जीवनात काही उपयोग असत नाही किंवा त्यामुळे विशेष अपायही होत नाही. रेडिओअॅक्टिव्ह पदार्थांमधून निघणारे किरण थेट अणूमधून निघाले असणार हे सिध्द झाले. अणूची अंतर्गत रचना कशी असावी याबद्दल केलेले तर्क सर्वमान्य झाले. त्याच्या केंद्रभागी 'प्रोटॉन' नावाचे घनविद्युतभारी कण असावेत आणि 'इलेक्ट्रॉन' नावाचे ऋणविद्युतभारी कण त्यांच्या सभोवती घिरट्या घालत असावेत हे मॉडेल सर्वमान्य झाले. प्रत्येक अणूत जेवढे प्रोटॉन्स तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात. पण त्यांचे इलेक्ट्रिकल गुणधर्म आणि वजन यात सुसंगती दिसत नसल्यामुळे प्रोटॉन्सच्या सोबत कोणताही विद्युतभार नसलेले 'न्यूट्रॉन्स' नावाचे कण असावेत अशी कल्पना पुढे आली. प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स यांचा अभ्यास होत गेला. वजन सोडून मूलद्रव्यांचे बाकीचे बहुतेक गुणधर्म या कणांच्यामुळे ठरतात आणि रासायनिक क्रियांमध्ये यांचा सक्रिय सहभाग असतो हे समजले, पण न्यूट्रॉन्स हे कण गूढ राहिले. काही काम न करणारे हे कण प्रोटॉन्सना चिकटून आळशी ठोंब्यासारखे स्वस्थ बसलेले असतात अशी सुरुवातीच्या काळातली समजूत होती. इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्सची दुनिया थोडी सुरस आणि चमत्कारिक वाटते. ऋण आणि घन विद्युत भारांमध्ये परस्परांबद्दल आकर्षण (attraction) असते आणि एकाच प्रकारचा भार (charge) असलेले पदार्थ एकमेकांना दूर ढकलत असतात (repulsion) असे सर्वसाधारणपणे दिसते. पण ऋणविद्युतभारी इलेक्ट्रॉन घनविद्युतभारी प्रोटॉन्सपर्यंत जाऊन त्यांना भेटत नाहीत, ते त्यांच्या सभोवती घिरट्या घालत राहतात. एका अणूमध्ये खूप इलेक्टॉन्स असले तर ते आपसांमधील रिपल्शनमुळे एकत्र असणार नाहीत हे कदाचित सहजपणे समजण्यासारखे आहे. ते निरनिराळ्या कक्षांमध्ये गटागटांमध्ये राहून फिरत राहतात. घनविद्युतभारी प्रोटॉन्स एकमेकांपासून दूर का जात नाहीत याचे आश्चर्य वाटेल. कोणताही विद्युतभार नसलेले न्यूट्रॉन्स त्यांना एका जागी धरून ठेवत असतात. न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स (यांना संयुक्तपणे न्यूक्लिऑन्स म्हणतात) यांना एकत्र बांधून ठेवणारी एक बाइंडिंग एनर्जी असते. ती त्या अणूच्या वस्तुमानाच्या स्वरूपात त्यात दडलेली असते. दोन किंवा अधिक फक्त प्रोटॉन्स एकमेकांसोबत राहू शकत नाहीत, पण त्यांच्यासमवेत न्यूट्रॉन्स असतील तर मात्र त्या सर्वांची मिळून पुरेशी बाइंडिंग एनर्जी होते आणि ते सर्वजण मिळून अणूच्या केंद्रभागी (nucleus) एकत्र राहतात. न्यूट्रॉनला अणूच्या केंद्रामधून बाहेर काढून त्याचे वेगळे अस्तित्व उपकरणांच्या द्वारे ओळखता आल्यानंतर या क्षेत्रातला आणखी एक नवा अध्याय सुरू झाला. त्यात न्यूट्रॉन्सच्या गुणधर्मांचा अभ्यास सुरू झाला. तसेच न्यूट्रॉन्सच्या निर्मितीचे तंत्र विकसित होताच न्यूट्रॉनमुळे इतर मूलद्रव्यांवर काय परिणाम होतात याचे संशोधन सुरू झाले. न्यूट्रॉनकडे कशाच्याही आरपार जाण्याची अद्भुत शक्ती असते. सर्व प्रकारच्या रेडिएशनला शिसे हा जड धातू अडथळा आणतो पण न्यूट्रॉन मात्र शिशाच्या जाड भिंतीमधून सुध्दा अतीशय वेगाने सरळ लीलया आरपार जातो. या उलट पाणी, मेण यासारख्या हलक्या पदार्थामधून जातांना त्याची गती मंद होते आणि दिशा बदलत राहून तो थोडा घुटमळत राहतो. सुटा न्यूट्रॉन फार काळ आपले अस्तित्व टिकवून धरत नाही. तो दुस-या एकाद्या अणूच्या केंद्रात शिरून तिथे असलेल्या न्यूट्रॉन्सच्या मेळाव्यात सामील होतो. तसे झाले नाहीच तर त्याचे विघटन होऊन एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन यांची जोडी जन्माला येते. दुस-या अणूमध्ये सामील झालेल्या या नव्या न्यूट्रॉनमुळे त्या अणूत गरजेपेक्षा अधिक ऊर्जा (बाइंडिंग एनर्जीमुळे) असल्याकारणाने तो अणू अस्थिर होऊन रेडिओअॅक्टिव्ह होतो आणि आपल्याकडील जास्तीच्या ऊर्जेला बाहेर टाकू लागतो. या प्रकारे अनेक मानवनिर्मित नवी मूलद्रव्ये किंवा त्यांचे आयसोटोप्स तयार होऊ लागले. आदिमानवाच्या काळात तो निस्रर्गातील वस्तूंचे तुकडे किंवा चेंदामेंदाच करू शकत होता, त्यात त्यांच्या अणूरेणूंवर काही परिणाम होत नसे. अग्नीला वश केल्यानंतर तो इंधनाच्या रेणूंचे परिवर्तन करू लागला आणि रसायनशास्त्रातील प्रगतीमुळे तो नवी संयुगे (कंपाउंड्स) तयार करायला शिकला होता, त्यात नवे मानवनिर्मित रेणू जन्माला आले. आता न्यूट्रॉन्सचा उपयोग करून त्याने निसर्गात अस्तित्वात नसलेले नवे अणू तयार केले. यातल्या काही अणूंचा वैद्यकशास्त्रात आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चांगला उपयोग होत असला तरी किरणोत्सारामुळे तापदायक ठरलेल्या अणूंचे प्रमाण फार मोठे आहे. न्यूट्रॉनच्या झोताचा मारा युरेनियम या धातूवर केला गेला तेंव्हा एक धक्कादायक सत्य जगासमोर आले. अचानक तो पदार्थ तापला आणि त्याच वेळी न्यूट्रॉन्सच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसली. युरेनियम धातूच्या यू२३५ या आयसोटोपच्या अणूच्या केंद्रामध्ये ९२ प्रोटॉन्स आणि १४३ न्यूट्रॉन्स असतात. त्यात आणखी एकाची भर पडली की ती संख्या १४४ होते आणि तयार झालेला यू २३६ हा नवा अणू इतका अस्थिर होतो की लगेच त्याचे भंजन होऊन दोन तुकडे पडतात. युरेनियमच्या केंद्रामधील काही प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स मिळून एक नवा अणू आणि आणखी काही प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स मिळून दुसरा नवा अणू तयार होतो. अशा प्रकारे एका मोठ्या अणूमधून दोन लहान अणू निघतात. तरीही दोन तीन न्यूट्रॉन्सना कशातच जागा मिळत नाही. ते सुटेच राहतात. या दोन नव्या अणूंमधील बाइंडिंग एनर्जीची बेरीज एकट्या यू २३५ मधील बाइंडिंग एनर्जीपेक्षा कमी असल्यामुळे ही जास्तीची ऊर्जा त्या नव्या अणूंना आणि सुट्या न्यूट्रॉन्सना मिळते. ही बाइंडिंग एनर्जी वस्तुमानाच्या रूपात असल्यामुळे दोन नवे अणू आणि दोन किंवा तीन न्यूट्रॉन्स यांच्या वस्तुमानाची बेरीज यू२३५ अणू आणि एक सुटा न्यूट्रॉन यांच्या बेरजेहून कमी असते आणि या फरकाचे रूपांतर ऊर्जेमध्ये होते. हीच ती अणूऊर्जा. या क्रियेमध्ये दोन तीन सुटे न्यूट्रॉन बाहेर पडत असल्यामुळे ते न्यूट्रॉन्स निरनिराळ्या यू २३५ अणूंचे भंजन करत जातात. यामुळे त्यांची संख्या वाढत जाऊन त्याची साखळी (chain reaction) तयार होऊ शकते आणि ती मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढत जाऊन भयंकर अक्राळविक्राळ रूप धारण करू शकते. वस्तुमानाचे रूपांतर प्रचंड ऊर्जेमध्ये होऊ शकेल हे न्यूट्रॉन्स आणि भंजन (Fission) यांची माहितीसुध्दा नसतांनाच्या काळात आईन्स्टाईनने केलेले भाकित अशा प्रकारे खरे ठरेल अशी शक्यता दिसू लागताच त्याच्या परिणामांचा विचार करता या विषयावरील सारे संशोधन अत्यंत गुप्त ठेवले जाऊ लागले. पण तेवढ्यात दुसरे महायुध्द भडकले. आपण जर शत्रूचा संहार केला नाही तर तो वरचढ ठरेल आणि त्यानंतर तो आपली गय करणार नाही अशा विचाराने मानवता, अहिंसा, शांती वगैरे सूज्ञपणाला बाजूला ठेवले गेले. भंजनाच्या तत्वाचा उपयोग करून युध्दपातळीवर काम करून एक संहारक अस्त्र तयार केले गेले आणि एका वाळवंटात त्याची चाचणी करून झाल्यावर ते अणूबाँब जपानवरील दोन शहरांवर टाकून त्या शहरांचा विध्वंस करण्यात आला. अशा प्रकारे अणूशक्ती पहिल्यांदा जगापुढे आली ती संहारक या रूपाने. कल्पनातीत एवढी प्रचंड ऊर्जा या वेळी एका स्फोटात क्षणभरात बाहेर पडली. मूलद्रव्यांचा अतीशय काटेकोर आणि सूक्ष्म अभ्यास करून त्यांच्या प्रत्येक आइसोटोपच्या अणूमधल्या बाइंडिंग एनर्जीचा अभ्यास करण्यात काही गोष्टी लक्षात आल्या. युरेनियमसारख्या जड अणूमध्ये खूप जास्त बाइंडिंग एनर्जी असते आणि त्या अणूचे दोन तुकडे झाले तर त्यातून तयार होणा-या दोन अणूंना मिळूनसुध्दा इतक्या बाइंडिंग एनर्जीची आवश्यकता नसते. त्यामुळे ती बाहेर पडते. लहान अणूंमध्ये याच्या नेमकी उलट परिस्थिती असते. हैड्रोजनच्या अणूमध्ये फक्त एकटा प्रोटॉन असल्यामुळे बाइंडिंग एनर्जीचा प्रश्नच नसतो. त्यात एक न्यूट्रॉन येऊन मिळाला तर ड्यूटेरियम हे हैड्रोजनचे आयसोटोप तयार होते आणि त्याच्या अणूमध्ये बाइंडिंग एनर्जी असते. त्यात आणखी एक न्यूट्रॉन आला तर त्याचे ट्रिशियम आयसोटोप बनते, हे अस्थिर असते. असे दोन अणू एकत्र आले तर त्यातून हीलियम वायूचा अणू तयार होतो, पण त्याची बाइंडिंग एनर्जी कमी असल्यामुळे या संमीलनातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. याला थर्मोन्यूक्लियर रिअॅक्शन म्हणतात आणि या तत्वावरूनच सूर्यामध्ये ऊष्णता तयार होत असते. आपल्याला ठाऊक असलेल्या सूर्य या सर्वात मोठ्या ऊर्जास्त्रोतातली ऊर्जा सर्वात लहान आकाराच्या हैड्रोजन अणूंपासून तयार होत असते एवढा या अणूऊर्जेचा प्रताप आहे.

Friday, April 08, 2011

परमाणु ऊर्जेचा शोध

ध्वनी, प्रकाश, ऊष्णता, हालचाल यांच्यासारखी ऊर्जेची रूपे आणि सजीवांच्या शरीरातली शक्ती हे आपल्या रोजच्या पाहण्यातले, अगदी आपल्या दैनंदिन जीवनाचे भाग आहेत. एकाच तत्वाची ही वेगवेगळी रूपे आहेत हे कदाचित सगळ्यांना ठाऊक नसेल. ऊन, वारा आणि नदीचा प्रवाह या निसर्गातील शक्तींचा उपयोग करून घेऊन आपले जीवन जास्त चांगले बनवण्याचे प्रयत्न मानव अनादिकालापासून करत आला आहे. मात्र त्यासाठी त्याला या श्रोतांकडे जाणे आवश्यक होते, तसेच त्यांच्यावर त्याचे नियंत्रण नव्हते. जेवढे प्रखर ऊन पडेल, जोराचा वारा सुटेल आणि ज्या वेगाने पाणी वहात असेल त्यानुसार त्याला आपले काम करून घ्यावे लागत असे. अग्नी चेतवणे आणि विझवणे याचे तंत्र अवगत करून घेतल्यानंतर ऊर्जेचे हे साधन त्याला केंव्हाही, कोठेही आणि हव्या तेवढ्या प्रमाणात मिळवणे शक्य झाले. साधे भात शिजवणे असो किंवा खनिजापासून धातू तयार करणे आणि त्याला मनासारखा आकार देणे असो, गरजेप्रमाणे चुली, शेगड्या आणि भट्ट्या वगैरे बांधून तो अग्नीचा उपयोग करत गेला. त्यासाठी विविध प्रकारचे ज्वलनशील, ज्वालाग्राही आणि स्फोटक पदार्थ त्याने शोधून काढले, तोफा आणि बंदुकांसारखी शस्त्रास्त्रे निर्माण केली, वाफेवर आणि तेलावर चालणारी इंजिने तयार केली. आता अग्निबाणांच्या सहाय्याने अवकाशात याने पाठवत आहे.

ऊर्जेच्या निरनिराळ्या रूपांचा आणि निसर्गातल्या ऊर्जाश्रोतांचा बारकाईने सखोल अभ्यास करून, त्यांना जाणून घेऊन त्यांचा अधिकाधिक उपयोग कसा करता येईल याचे प्रयत्न मानव सुरुवातीपासून करत आला आहे. नदीच्या खळाळणा-या पाण्याला कशामुळे जोर मिळतो? ती नेहमी पर्वताकडून समुद्राकडेच का वाहते? याचा विचार करतांना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे घडत असल्याचे त्याच्या लक्षात आले. वाहत्या पाण्यामधली वाहण्याची शक्ती त्याला पृथ्वीकडून मिळते. पण त्या आधी ते पाणी पर्वतावर कसे जाऊन पोचते? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याची सूर्याच्या उन्हाने वाफ होते आणि ती वातावरणात उंचावर जाते, (या गोष्टीलासुध्दा पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती कारणीभूत असते) त्यातून ढग तयार होतात आणि डोंगरावर जाऊन ते बरसतात. याचाच अर्थ जमीनीवरील किंवा समुद्रामधील पाण्याला आधी सूर्यापासून ऊर्जा मिळते. ती सुप्त अवस्थेत (पोटेन्शियल एनर्जी) असते, पृथ्वीच्या आकर्षणाने पाणी वाहू लागल्यावर त्याला गतिमान रूप (कायनेटिक एनर्जी) मिळते. याचप्रमाणे वाळवंटामधील हवा उन्हाने तप्त होऊन विरळ होते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे या हवेचा तिच्यावर जो दाब पडत असतो तो हलका होतो आणि जास्त दाब असलेली तुलनेने थंड हवा तिकडे धाव घेते. याला आपण वारा म्हणतो. म्हणजेच वाहत्या वा-यामधील ऊर्जासुध्दा त्याला सूर्याकडूनच मिळते. पण सूर्य आणि अग्नी यांची ऊर्जा कोठून येते? या प्रश्नाची उकल साध्या निरीक्षणांमधून होत नव्हती.

शस्त्रास्त्रे आणि यंत्रे यांच्या बरोबरीने नवनवी उपकरणेसुध्दा मानव बनवत गेला आणि त्यांच्याद्वारे त्याने आपली निरीक्षणशक्ती अमाप वाढवली. ज्यांची जाणीव माणसाच्या पाच ज्ञानेंद्रियांना होऊ शकत नाही अशी निसर्गातली अनेक रहस्ये त्यातून उलगडली गेली. कानाला ऐकू न येणारे आवाज, डोळ्यांना दिसू न शकणारे प्रकाशकिरण आणि बोटाला न जाणवणारी स्पंदने यांचे अस्तित्व समजले, त्यांची निर्मिती आणि मोजमाप करणे शक्य झाले. ज्ञानसंपादनाच्या अनेक नव्या खिडक्या उघडल्यामुळे नवनवे वैज्ञानिक शोध लागत जाण्याच्या प्रक्रियेला वेग आला.

विश्वामधील सर्व पदार्थ अतीसूक्ष्म अशा कणांपासून बनले आहे ही कल्पना मनात रुजल्यानंतर त्याने या कणांचा कसून अभ्यास केला. त्यांना अणू (मॉलेक्यूल) असे नाव दिले. हे अणू साध्या डोळ्यांनी तर नाहीच, पण दुर्बिणीमधूनसुध्दा प्रत्यक्षात दिसत नसले तरी शास्त्रज्ञांनी त्यांच्या रचनेबद्दल संकल्पना मांडल्या आणि पदार्थांच्या प्रत्यक्ष निरीक्षणांमधून त्यांना अप्रत्यक्षपणे पण निश्चित स्वरूपाचा दुजोरा मिळत गेला. या सूक्ष्म कणांच्या अभ्यासातून त्यांचे जे गुणधर्म समजले, त्यात असे दिसले की हे सर्व कण चैतन्याने भारलेले असतात. याची अनेक सोपी उदाहरणे दाखवता येतील.

भरलेला फुगा फोडला की त्याच्या आतला वायू क्षणार्धात हवेत विरून जातो, त्याला परत आणता येत नाही. कारण त्यातील सूक्ष्म कण स्वैरपणे इतस्ततः भरकटत असतात. स्वच्छ पाण्याने भरलेल्या पेल्यात कोकाकोलाचा एक थेंब टाकला की तोसुध्दा सगळीकडे पसरतांना दिसतो, कारण द्रवरूप पदार्थांचे सूक्ष्म कण सुध्दा एका जागेवर स्थिर न राहता वायूंपेक्षा कमी वेगाने पण सतत संचार करत असतात. घनरूप पदार्थांचे तपमान वाढले की ते प्रसरण पावतात आणि कमी झाले की आकुंचन पावतात, कारण त्यांचे सूक्ष्म कण सुध्दा जागच्या जागीच हालचाल करत असतात. थोडक्यात सांगायचे झाले तर जड वस्तूंच्या सूक्ष्म कणांमध्ये सुध्दा एक चैतन्य असते. एक प्रकारची सुप्त ऊर्जा अणुरेणूंमध्ये भरलेली असते. ज्या वेळी ती ऊर्जा ध्वनी, प्रकाश, ऊष्णता, गतिमानता यासारख्या रूपामध्ये प्रकट होते तेंव्हा ती आपल्या जाणीवांच्या कक्षेत येते. तिला ओळखणे, तिचे मापन करणे, त्याचा उपयोग करून घेणे अशा गोष्टी आपल्याला अवगत असतील तर आपल्याला ती ऊर्जा प्राप्त झाली असे वाटते.

निरनिराळ्या स्वरूपातील ऊर्जेचे अस्तित्व, एका जागेवरून दुस-या जागेकडे होणारे तिचे वहन, ऊर्जेचे एका रूपामधून दुस-या रूपात रूपांतर होणे वगैरेंसाठी निसर्गाचे निश्चित असे स्थलकालातीत नियम आहेत. ते व्यवस्थित समजून घेऊन त्यांचा उपयोग करून घेण्याचे काम वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ करत असतात. त्यांच्या प्रयत्नांमधून ऊर्जेचे अद्भुत नवे श्रोत मानवाला मिळत गेले. आपली पृथ्वी स्वतःच एक महाकाय लोहचुंबक आहे आणि तिचे चुंबकीय क्षेत्र आपल्या संवेदनांना जाणवत नसले तरी ते आपल्या चहू बाजूंना पसरले आहे हे समजले. आकाशामधून धरतीवर कोसळणा-या विद्युल्लतेकडे पाहून भयभीत होण्यापलीकडे काहीही करू न शकणारा मानव कृत्रिम रीत्या विजेचे उत्पादन करू लागला. यात त्याने इतकी विविधता आणली आणि इतके नैपुण्य संपादन केले की अत्यंत प्रखर अशी ऊष्णता निर्माण करणे, महाकाय यंत्रांची चाके फिरवणे, लक्षावधी गणिते चुटकीसरशी सोडवणे किंवा जगाच्या पाठीवरील दूर असलेल्या ठिकाणी आपले संदेश अतीशय सूक्ष्म अशा विद्युल्लहरींमधून कल्पनातीत वेगाने पाठवणे अशी निरनिराळ्या प्रकारची कामे तो विजेकडून करून घेऊ लागला आहे.

विश्वातील असंख्य पदार्थाची रचना असंख्य निरनिराळ्या प्रकारच्या अणूंपासून झाली असली सुमारे फक्त शंभर एवढ्याच मूलद्रव्यांपासून हे असंख्य पदार्थ निर्माण झाले आहेत. या मूलद्रव्यांच्या सूक्ष्मतम कणांना परमाणु (अॅटम) असे नाव ठेवले. अर्थातच दोन किंवा अधिक परमाणूंच्या संयोगातून अणू बनतात हे ओघाने आले. जेंव्हा कोळशाच्या म्हणजे कार्बन या मूलद्रव्याचा प्राणवायू (ऑक्सीजन)शी संयोग होतो. तेंव्हा कर्बद्विप्राणिल (कार्बन डायॉक्साइड) वायू तयार होतो आणि त्याबरोबर ऊष्णता बाहेर पडते. यामधील ऊर्जा कोठून येते? असा प्रश्न पूर्वी अनुत्तरित होता. त्याचे उत्तर मिळाले ते असे. जेंव्हा दोन कमावत्या व्यक्ती एकत्र राहू लागतात, तेंव्हा त्यांचे काही आवश्यक खर्च समाईकपणे भागवले जातात आणि त्यामुळे पूर्वी त्यावर खर्च होणारे त्यांचे काही पैसे शिल्लक राहतात. त्याप्रमाणे दोन वेगवेगळे परमाणु एकत्र आले की त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेली ऊर्जेची एकंदर गरज कमी होते आणि ही जास्तीची ऊर्जा ऊष्णतेच्या स्वरूपात त्या नव्या अणूला मिळते. ही ऊर्जा कार्बन आणि ऑक्सीजन या पदार्थांमध्येच सुप्त रूपाने (केमिकल पोटेन्शियल एनर्जी) वास करत असते, ज्वलनाच्या रासायनिक क्रियेमुळे आपल्याला जाणवेल अशा स्वरूपात ती बाहेर पडते.

अग्नीमधून मिळणारी ऊर्जा कोठून आली या प्रश्नाला मिळालेल्या या उत्तराबरोबर ऊष्णता निर्माण करणा-या असंख्य रासायनिक प्रक्रियांचे (एक्झोथर्मिक रिअॅक्शन्सचे) गूढ उलगडले. कृत्रिम रीत्या विजेचे उत्पादन करतांना ती कशी निर्माण होते हे मानवाला समजले होतेच. सूर्य आणि आकाशातल्या ता-यांमधून बाहेर पडत असलेल्या ऊर्जेचा श्रोत कोणता हे अजून गूढ होते. एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीला मादाम मेरी क्यूरीने रेडिओअॅक्टिव्हिटीचा शोध लावला आणि पदार्थविज्ञानात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. रेडियम या मूलद्रव्याचा दुस-या कशाशीही संयोग न होता आणि त्याच्या कोणत्याही गुणधर्मांमध्ये कसलाही बदल न होता विशिष्ट प्रकारचे प्रकाशकिरण त्या धातूमधून सतत कसे बाहेर पडत असतात हे एक नवे गूढ जगापुढे आले. अत्यंत सूक्ष्म प्रमाणातल्या अदृष्य अशा प्रकाशकिरणांचे अस्तित्व दाखवणारी, त्यांच्या तीव्रतेचे मापन करणारी उपकरणे तयार झाल्यानंतर अशा प्रकारचे अनेक पदार्थ निसर्गामध्ये असल्याचे समजले. सर्वात हलक्या हैड्रोजनपासून सर्वात जड युरेनियमपर्यंत ज्ञात असलेल्या बहुतेक मूलद्रव्यांना रेडिओअॅक्टिव्ह भावंडे असल्याचे दिसून आले.

अनेक शास्त्रज्ञ हे गूढ उकलण्याच्या कामाला लागले. ही ऊर्जा कोणत्याही भौतिक (फिजिकल) किंवा रासायनिक (केमिकल) क्रियेमधून निर्माण होत नव्हती याची खातरजमा करून घेतल्यानंतर ती ऊर्जा त्या परमाणूमध्येच दडलेली असणार हे निश्चित झाले. परमाणूंच्य़ा अंतर्गत रचनेबद्दल तर्क करण्यात येत होते. शंभरावर असलेलेच्या मूलद्रव्यांचे परमाणू प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स या फक्त तीनच अतीसूक्ष्म मूलभूत कणांपासून निर्माण झाले असावेत हा सिध्दांत सर्वमान्य झाला आणि अणूंच्या अंतरंगात या अतीसूक्ष्म कणांची रचना कशाप्रकारे केली गेलेली असेल यावर अंदाज बांधले जाऊ लागले. यातली कोणतीही गोष्ट प्रत्यक्ष प्रमाणाने दाखवता येणे शक्य नव्हतेच. पण ती अशी असेल तर त्या पदार्थांमध्ये असे गुणधर्म येतील असे तर्क करून आणि ते गुणधर्म तपासून पाहून त्या सिध्दांतांची शक्याशक्यता तपासण्यात आली. त्यानुसार प्रत्येक अणूच्या केंद्रभागी प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स यांच्या समूहातून निर्माण झालेला न्यूक्लियस असतो आणि इलेक्ट्रॉन्स गटागटाने सदोदित त्याच्या भोवती घिरट्या घालत असतात असे मॉडेल सर्वमान्य झाले. काही परमाणूंची रचना अस्थिर (अनस्टेबल) असते. त्यांच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा असते. तिला बाहेर टाकून देऊन तो परमाणू स्थैर्याकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करत असतो. या क्रियेमधून ही ऊर्जा बाहेर पडत असते हे सर्वमान्य झाले. सू्र्य आणि तारकांमध्ये असेच काही तरी घडत असणार असा अंदाज करण्यात आला.

वस्तुमान, अंतर आणि वेळ ही मूलभूत तत्वे आहेत असे धरून त्यांच्या आधाराने इतर सर्व गुणधर्मांचे मोजमाप करता येत असे, अजूनही ते तसेच केले जाते. पण या तीन्ही गोष्टी सापेक्ष आहेत असे प्रतिपादन आल्बर्ट आइन्स्टाइन याने शतकापूर्वी केले. मानवाच्या सर्वसामान्य जाणीवांशी विपरीत असलेला हा विचार कोणाच्याही पचनी पडणे कठीण होते. त्याला शंभर वर्षे उलटून गेली असली तरी सापेक्षतासिध्दांताबद्दल (रिलेटिव्हिटी थिअरीबद्दल) आत्मविश्वासाने बोलणारे लोक आजसुध्दा कमीच आढळतात. पण शुध्द तर्क आणि क्लिष्ट गणित यांच्या सहाय्याने आइन्स्टाइनने आपले विचार तत्कालीन शास्त्रज्ञांना पटवून दिले. त्याच्या सिध्दांताच्या धाग्याने विश्वाचा विचार केल्यानंतर वस्तुमान आणि ऊर्जा ह्या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सिध्द होते. तसे असल्यास वस्तूमानाचे परिवर्तन ऊर्जेमध्ये होणे सुध्दा शक्य असावे आणि ते झाल्यास E=mCxC एवढ्या प्रचंड प्रमाणात लहानशा वस्तुमानाच्या बदल्यात अपरिमित ऊर्जा मिळू शकेल असे भाकित त्याने केले. ही क्रिया नक्की कशा प्रकारे होईल हे त्या काळात तो सांगू शकत नव्हता. त्यामुळे ही गोष्ट तो सप्रयोग सिध्द करू शकत नव्हता. पण तो आपल्या भाकितावर ठाम होता. इतर काही शास्त्रज्ञांनी ही किमया घडवून आणली आणि आइन्स्टाइनच्या जीवनकालातच त्याचे प्रत्यक्षप्रमाण जगाला दाखवले.

सू्र्य आणि तारकांमधील ऊर्जेचे रहस्य काही प्रमाणात उलगडले, तसेच अणुशक्ती किंवा परमाणू ऊर्जा ही एक वेगळ्या स्वरूपातली ऊर्जा मानवाच्या हातात आली.

Tuesday, April 05, 2011

मोबाइलने केले एप्रिल फूल

त्या दिवशी दुपारी मस्त जेवण करून मी वामकुक्षीच्या नावाने ताणून दिली होती. कसलीशी चाहूल लागून झोप चाळवली तेंव्हा अलका तयार होऊन बाहेर जायला निघाली असल्याचे दिसले. वाशीमध्येच राहणा-या एका मैत्रिणीला सोबत घेऊन ती मुंबईतल्या मैत्रिणीकडे जायला निघाली होती. त्यांच्या आठदहा मैत्रिणी तिथे जमणार होत्या. मला आता तीन चार तास निवांतपणा मिळणार होता. अलकाला बायबाय करून मी संगणक सुरू केला आणि आंतर्जालावर उड्डाण केले. त्या महासागराच्या लाटांवर सिंदबादप्रमाणे मुशाफिरी करता करता अलीबाबाच्या गुहा शोधत असतांना अमूल्य रत्नांनी भरलेला एक खजिना सापडला. 'तिळा दार उघड'चा मंत्र लिहून त्यावर टिचकी मारणार एवढ्यात फोनची घंटा खणाणली. या अवेळी कोणालाही माझी आठवण आली असण्याची शक्यता मला दिसत नव्हती. अलकाच्याच एकाद्या मैत्रिणीने "निघालीस का? केंव्हा पोचणार आहेस?" अशा चौकशा करण्यासाठी फोन लावला असणार असे वाटले. चार पाच वेळा वाजू दिल्यानंतरसुध्दा घंटा वाजायची थांबली नाही तेंव्हा "काय कटकट आहे?" असे चरफडत उठलो आणि रिसीव्हर उचलला.

अलका स्वतःच फोनवर होती. तिला घरातून निघून दहा मिनिटे सुध्दा झाली नव्हती, म्हणजे ती अजून वाटेतच असणार. तिला अचानक काय झाले असेल या शंकेच्या अनेक पाली मनात चुकचुकल्या. "अहो मी ठीक आहे, पण आपली गाडी .." ती सांगत होती. "वाशीच्या पुलावर बंद पडली. आता मी काय करू?"
त्यावर मी तिला काय सांगणार? गेली दहा वर्षे ती सराईतपणे गाडी चालवत असली तरी कधीही तिने कारचे बॉनेट उघडून त्यात डोकावून पाहिल्याचे मला आठवत नाही. त्यात दिसणा-या कशाला इंजिन म्हणतात हे तिला ठाऊक असेलच याची मला शाश्वती वाटत नव्हती. आतल्या काळ्याकुट्ट यंत्राच्या कुठल्याही भागाला बोट जरी लावले तरी ते काळे होईल आणि त्याला कसलासा घाणेरडा वास येईल या धास्तीने तिने कधीही त्यातल्या कशालाही स्पर्श केलेला मला दिसला नव्हता. त्यामुळे या वेळी ती स्वतः काही करू शकेल याची फारशी शक्यता नव्हती.
मी सांगितले, "घाबरू नकोस, तिथेच थांब, मी येतोय्."
तिला एवढे सांगून मी उघडलेल्या सर्व गुहांचे दरवाजे थडाथड बंद केले, संगणकाला निपचित पाडले आणि कपडे बदलले. पण ते करत असतांना माझ्या मनात विचार आला की मी तरी तिथे जाऊन काय करणार आहे? इंजिन कशाला म्हणतात एवढे मला ठाऊक असले आणि फक्त बोटच काय पण शर्टाची बाहीसुध्दा ग्रीसने माखून घेण्याची माझ्या मनाची तयारी असली तरी त्याचा काय उपयोग होता? बंद पडलेले इंजिन सुरू करण्याचे काडीएवढे ज्ञान किंवा पूर्वानुभव माझ्या गाठी नव्हतेच. त्यामुळे सर्व्हिस सेंटरचा फोन नंबर शोधून काढला आणि मेकॅनिकला बोलावून घेतले. तो तयार झाला हे पाहून झाल्यावर त्याला अलकाच्या मोबाईलचा नंबर आणि अलकाला त्याचा नंबर दिला आणि टॅक्सीने घटनास्थळावर जाऊन पोचलो.

तोपर्यंत मेकॅनिक जसबीर तिथे आला होता आणि त्याने गाडीचे बॉनेट उघडून ते पुन्हा बंद सुध्दा केले होते. बहुधा त्याच्या दिव्य स्पर्शानेच इंजिनाचा घरघराट पुन्हा सुरू झाला असावा.
"आता गाडी चालू झाली आहे, आणखी दहा बारा किलोमीटरपर्यंत तरी ती चालायला हरकत नाही. मुंबईत पोचल्यानंतर तिकडच्या मेकॅनिककडून तपासून घ्या. मी त्याला म्हणजे महेशला फोन करून कळवले आहे. तुम्ही जाणार आहात त्या जागी तो येऊन आणखी दुरुस्ती करून देईल. बहुधा फ्यूएल पंपचा प्रॉब्लेम असावा. तुम्ही गाडी घेऊन चला, मी मागेमागे येतोच आहे." जसबीरने सांगितले. इतके सहकार्य माझ्या अपेक्षेच्या बाहेर होते.

त्याचे आभार मानून (आणि अर्थातच त्याची व्हिजिट फी देऊन) आम्ही पुढे निघालो. मुंबईच्या हद्दीत जेमतेम येऊन पोचतो तेवढ्यात अलकाच्या मोबाईलवर एक फोन आला. तिच्या शेजारी बसलेल्या तिच्या मैत्रिणीने उचलला. "आमची गाडी आता चालू झाली आहे आणि शिवाय एक मेकॅनिक मागे मागे येतो आहे." असे सांगून तिने बंद करून टाकला. तो कॉल कुणाचा होता याची चौकशी करावी असे तिला वाटले नाही की त्या माणसाकडे हा नंबर कसा आला असा प्रश्न तिला पडला नाही. "कुणाचा का असेना, आपल्याला काय करायचे आहे?" अशा गुर्मीत ती होती. मी मागे वळून पाहिले तर जसबीर अदृष्य झाला होता. दुपदरी रस्ता असल्यामुळे आमच्या मागे पुलाच्या दुस-या टोकापर्यंत येणे त्याला भागच होते. तिथपर्यंत आल्यानंतर आमची गाडी ठीक चालली आहे हे पाहून तो परत गेला होता. "तो तर पुढे गेला, मी पाहिले.." असे उत्तर आले. आम्हाला कोठे जायचे आहे हे अंतर्ज्ञानाने ओळखून तो आमच्या आधीच तिथे जाऊन पोचला असता तर मी त्याला भररस्त्यात साष्टांग नमस्कार घातला असता. पण तसे काही झाले नाही. आम्ही गाडी चालवत चालवत मैत्रिणीच्या घरापर्यंत आलो. वाटेत काही त्रास झाला नाही. जसबीर तिथे येईल अशी माझी अपेक्षा नव्हतीच, आता महेश केंव्हा येणार हे पहायचे होते. त्याचा मोबाइल फोन नंबर अलकाच्या मोबाईलमध्ये नमूद केला होता तो लावला.

"पाच मिनिटांपूर्वी सांगितलेत की तुम्हाला दुसरा मेकॅनिक मिळाला आहे आणि तुमची गाडी ठीक झाली आहे. आता मी कशाला येऊ?" महेशने घुश्श्यातच फोन बंद करून टाकला. पुन्हा जसबीरशी बोलून झालेला गोंधळ त्याला सांगितल्यावर त्याने महेशशी बोलून त्याला राजी केले. गाडी आणि मोबाईल माझ्याकडे सोपवून अलका तिच्या मैत्रिणीसह बिल्डिंगमध्ये चालली गेली, रस्त्यावर उभा राहून महेशाची वाट पहात होतो. दहा पंधरा मिनिटे झाली तरी त्याची येण्याची लक्षणे दिसत नव्हती. त्याला फोन करून चौकशी करावी असा विचार केला. अलकाच्या फोनमधले केलेले आणि आलेले (कॉल्ड आणि रिसीव्ह्ड नंबर्स) कॉल्स यांच्या याद्या पाहतांना महेशचे नाव दिसले आणि मी कॉलचे बटन दाबले. त्यात नेमका काय गोंधळ झाला होता ते मला अजून समजलेले नाही.
हॅलो, हॅलो करून झाल्यावर मी म्हंटले "महेश, तू कुठे आहेस, केंव्हा येणार आहेस?"
पलीकडून "अं.. अं.. कोण महेश?" वगैरे भांबावलेले उद्गार ऐकल्यानंतर "सॉरी, राँग नंबर" असे म्हणून मी फोन बंद केला. सेव्ह केलेल्या लिस्टमधून महेशचा नंबर शोधून काढला. या वेळी त्यात काही चूक नाही याची खात्री करून घेतल्यावर मी कॉलचे बटन दाबणार एवढ्यात फोनची रिंग वाजली. अजयचा फोन होता. त्याच्या संवयीप्रमाणे आता तासभर तरी तो चालू ठेवणार याची गॅरंटी होती. त्याच्या घरातल्या सर्वांबरोबर आमच्या घरातल्या सर्वांनी बोलायचे आणि चुलत, मावस, आते, मामे भावंडांपासून ते वर्ल्डकप आणि सुनामीपर्यंत जगातल्या सगळ्या घटनांवर खुलासेवार चर्चा करायची तर एवढा वेळ लागणारच. एरवी असे तासतासभर बोलायला आम्हालासुध्दा आवडते, पण या वेळी माझ्यापाशी त्यासाठी वेळही नव्हता आणि गप्पा मारायचा मूडही नव्हता. लवकरात लवकर केंव्हा हा महेश प्रसन्न होऊन दर्शन देईल आणि मला उन्हात उभे राहण्याच्या तपश्चर्येपासून मुक्ती देईल असे मला झाले होते. त्यामुळे मी "अरे, आत्ता मी खूप बिझी आहे. थोड्या वेळाने फोन कर" एवढे सांगून त्याचा फोन कट केला आणि महेशाच्या आराधनेला लागलो.

थोड्या वेळाने तो आला आणि मी त्याला आमच्या गाडीची हकीकत सांगत होतो तेवढ्यात मोबाईल वाजला. यावेळी शिल्पा लाईनवर होती. महेशशी चाललेले बोलणे अर्धे सोडून तिच्याशी बोलणे त्या क्षणी मला शक्य नसल्यामुळे "आत्ता मी खूप बिझी आहे. थोड्या वेळाने फोन कर" असेच तिलाही सांगितले. गाडी रिपेअर झाल्यानंतरही महिलामंडळाची सभा संपायला वेळ होता. त्यांच्यामध्ये जाऊन मला 'बायकात पुरुष लांबोडा' व्हायचे नव्हते, म्हणून जवळ रहात असलेल्या रश्मीच्या घरी गेलो. मला असा अचानक आलेला पाहून तिला आनंद झाला, आश्चर्य वाटले की रिलीफ वाटला अशा संमिश्र भावना आणि अनेक प्रश्न तिच्या चेहे-यावर दिसत होते.
"काका, तुम्ही कसे आहात आणि मावशी कशी आहे, ती कुठे आहे?" तिने आल्या आल्या माझ्यावर प्रश्नांचा भडिमार केला. असे काय झाले होते ते मलाच समजेना.
"अहो आम्ही सगळे केवढ्या काळजीत होतो?" रश्मी म्हणाली
"आम्ही दोघेही मजेत आहोत" मी सांगितले, "पण तुम्हाला आमची काळजी करायला काय झालं?"
आमची गाडी बंद पडल्याची बातमी सुध्दा यांच्यापर्यंत पोचण्याचे काहीच कारण मला दिसत नव्हते. ती पुलावर उभी असल्याचे कोणी जाणा-या येणा-या ओळखीच्या माणसाने पाहिले असले तरी मग तो मदतीला का आला नाही? आणि ती गोष्ट यांना सांगायची काय गरज होती?
"आत्ता मला माझ्या आईचा फोन आला होता, ती तुमची चौकशी करत होती"
"का?"
"कारण तिला शिल्पाचा फोन आला होता आणि ती सांगत होती की तुम्ही तिच्याशी आणि अजयशीसुध्दा नीट बोलला नाहीत म्हणून!"
"बाप रे!"
"त्या सगळ्यांना असे वाटले की तुम्ही दोघे कसल्या तरी मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहात."
"तसे असते तर मग आम्ही तुम्हालाच सांगितले नसते का? तुमच्याशी बोलणे टाळले कशाला असते? या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? आधी अजयने मला कशासाठी फोन केला होता?"
माझ्या मनात प्रश्नच प्रश्न उठत होते.
हळूहळू त्याचा उलगडा झाला. मेकॅनिक महेशला मी केलेला फोन उदयला लागला होता. पण ते यंत्र महेश नावाच्या त्याच्या मित्राने त्याला थोड्या दिवसासाठी दिले होते. "महेश " एवढे नाव उदयने ऐकल्यावर महेशला निरोप देण्यासाठी उदयने फोन नंबर पाहिला तो ओळखीचा म्हणजे अलकाचाच होता. ही गोष्ट त्याने बाजूलाच बसलेल्या अजयला सांगितल्यावर चौकशी करून घेण्यासाठी त्याने अलकाला फोन लावला, तो तिने न उचलता मी उचलला आणि लगेच बंद केला. हे सगळे त्यांना अपेक्षित नसल्यामुळे इतरांना सांगितले आणि त्यांना काही माहिती आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
अशा प्रकारे एका मोबाईलमुळे आम्ही सगळे एप्रिल फूल झालो!

Friday, April 01, 2011

फुकुशिमा येथील दुर्घटनेच्या निमित्याने (उत्तरार्ध)




११ मार्चपासून फुकुशिमा पॉवर स्टेशनमध्ये घडत गेलेल्या घटनांकडे पाहण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. माणसाच्या शरीरात जठर, यकृत, फुफ्फुसे वगैरे इंद्रिये असतात आणि त्यांचे कार्य कसे चालते वगैरे आपण पुस्तकातून शिकतो, पण केंव्हाही त्या इंद्रियांच्या आतमध्ये नेमके काय चालले आहे किंवा काय होऊन गेले हे आपल्याला बाहेरून समजण्याची कसलीही निसर्गदत्त सोय नाही. त्याचप्रमाणे रिअॅक्टरची रचना आणि कार्यपध्दती माहीत असली तरी त्याच्या अंतर्गत भागात नेमके काय घडत आहे याचे खडान् खडा वृत्त बाहेरून समजत नाही. त्यासाठी प्रेशर, टेंपरेचर यासारखी अनेक प्रकारची मोजमापे घेणारी आणि त्यांची नोंद ठेवणारी उपकरणे असतात, पण तीच बिघडून गेली तर त्यांच्यापासून मिळणारी माहिती मिळत नाही किंवा मिळालेली माहिती विश्वासार्ह रहात नाही. शरीराला आलेला ताप, सूज, मळमळ, जळजळ, खोकल्याची ढास, वेदना वगैरे बाह्य लक्षणांवरून ते व्याधीग्रस्त झाल्याचे समजते आणि नाडीपरीक्षा, रक्तदाब, रक्ताची तपासणी, क्ष किरण, सोनोग्राफी यासारख्या खास परीक्षणांमधून त्याचे निदान केले जाऊन त्यावर उपाययोजना होते. रिअॅक्टरमध्ये मोठा बिघाड झाला तर त्याची चिकित्सासुध्दा दृष्य, आवाज, तपमान यासारख्या बाह्य लक्षणांवरून आणि निरनिराळ्या ठिकाणी मोजलेली वेगवेगळ्या विकीरणांची तीव्रता यासारख्या काही मोजमापांवरून केली जाते आणि त्यावर उपाययोजना केली जाते. ती करतांना रिअॅक्टरच्या स्वास्थ्याची काळजी बाळगण्यापेक्षा त्यापासून माणसांना हानी पोचणार नाही किंवा ती कमीतकमी पोचावी याला प्राधान्य दिले जाते. या प्रयत्नांमध्ये रिअॅक्टरचे नुकसान झाले तर त्याची पर्वा केली जात नाही. रुग्णाला दिलेल्या औषधोपचारातून त्याचे जठर, फुफ्फुस, हृदय यांच्या काम करण्यात नेमका कोणता आणि किती फरक पडला हे शरीराच्या बाह्य लक्षणावरूनच ठरवावे लागते. त्याचप्रमाणे रिअॅक्टरमध्ये काय चालले आहे याचा अंदाजसुध्दा अशा बाह्य निरीक्षणावरूनच घ्यावा लागतो. हे काम करत असलेल्या तंत्रज्ञांना त्यातले जेवढे समजलेले असते त्यातला थोडासा भाग ते जाहीर करतात आणि त्यात स्वतःचे तिखटमीठ मिसळून वार्ताहर त्याला प्रसिध्दी देतात. यामुळे निरनिराळ्या वाहिन्यांवरील बातम्या आणि वर्तमानपत्रांमधले वृत्तांत यात तफावत आढळते. या विषयावरील जेवढी माहिती मला वेगवेगळ्या सूत्रांकडून घरबसल्या मिळाली, त्यातली जेवढी उमगली आणि सुसंगत वाटली त्याच्या आधारावर हा लेख लिहिला आहे. या घटनेची चौकशी करणा-या औपचारिक यंत्रणेशी माझा कसलाही संबंध नाही आणि कोणाचीही बाजू घ्यायचे मला कारण नाही हे आधीच नमूद करतो.

वर दिलेल्या पहिल्या चित्रात बॉइलिंग वॉटर रिअॅक्टरवर चालणा-या वीजनिर्मितीकेंद्राचे रेखाचित्र आहे, दुस-या चित्रात रिअॅक्टर व्हेसलची अंतर्गत रचना आहे आणि तिस-या चित्रात रिअॅक्टर बिल्डिंगमधील रचना आहे. ही चित्रे प्रातिनिधिक आहेत. तंतोतंत फुकुशिमाची नाहीत. त्यामुळे तपशीलात थोडा फार फरक असू शकतो. माझ्या पहिल्या लेखात लिहिल्याप्रमाणे जेंव्हा हे केंद्र व्यवस्थित कार्य करत असते त्यावेळी इंधनातील भंजनक्रियेतून रिअॅक्टरमध्ये ऊष्णता निर्माण होते, त्यामधून प्रवाहित होत असलेल्या पाण्यापासून उच्च दाबाची वाफ तयार होते, त्या वाफेवर टर्बाइन चालते आणि त्याला जोडलेल्या जनरेटरमध्ये निर्माण झालेली वीज ग्राहकांना पुरवली जाते. टर्बाइनमधून बाहेर पडलेल्या वाफेचे कंडेन्सरमध्ये पुन्हा पाण्यात रूपांतर होते आणि ते पाणी बाष्पीभवनासाठी रिअॅक्टरमध्ये परत जाते.

फुकुशिमा दायची विद्युतकेंद्रात अशा प्रकारचे सहा रिअॅक्टर आहेत. त्यापैकी युनिट क्र, ४, ५ आणि ६ काही दिवसापासून इन्स्पेक्शन, मेंटेनन्स वगैरेंसाठी बंद होते. ११ मार्च रोजी १, २ आणि ३ क्रमांकांची केंद्रे चालत होती. भूकंपाचा जोराचा धक्का बसताच ती आपोआप बंद झाली. त्यामधील फिशन थांबले असले तरी रेडिओअॅक्टिव्ह डिकेमधून मोठ्या प्रमाणावर ऊष्णता बाहेर पडत होती आणि ती वाहून नेणे आवश्यक होते. युनिट बंद होताच टर्बाइनचे फिरणे थांबते. त्यामुळे ही वाफ थेट कंडेन्सरकडे किंवा दुस-या हीट एक्स्चेंजरमध्ये नेऊन थंड करावी लागते. वाफेची निर्मिती थांबल्यानंतर तापत असलेले गरम पाणी या हीट एक्स्चेंजरमध्ये फिरवून निववले जाते. या पाण्याचे तसेच त्याला थंड करण्यासाठी समुद्रातील किंवा कूलिंग टॉवरमधील पाण्याचे अभिसरण करण्यासाठी काही पंप चालवावे लागतात. बॉइलिंग वॉटर रिअॅक्टरमधील वाफ रेडिओअॅक्टिव्ह असल्याकारणाने ती हवेत सोडून देता येत नाही. तिला थंड करून बंदिस्तच ठेवावे लागते. गरजेनुसार रिअॅक्टरचे बंद करणे आणि पुन्हा सुरू करणे या नेहमीच्या क्रिया असल्याने रिअॅक्टर बंद केल्यानंतर त्याला थंड करण्याची योजना सर्व ठिकाणी केलेली असते आणि एरवी ती सुरळीतपणे चालते. अशा वेळी पॉवर स्टेशनमधील इतर युनिट्स चालू असल्यास त्यांच्याकडून विजेचा पुरवठा उपलब्ध असतो. तो नसेल तर ग्रिडला जोडलेल्या तारांच्या जाळ्यामधून बाहेरची वीज मिळू शकते. ते सुध्दा शक्य नसेल तर पुरेशी वीजनिर्मिती करण्यासाठी मोठमोठी डिझेल जनरेटर्स तयार ठेवलेली असतात. त्याशिवाय मोठ्या बॅटरी बँक्स असतात. कंट्रोलरूममधील सर्व उपकरणे, त्यांना माहिती पोचवणारी सारी उपकरणे, काँप्यूटर्स, महत्वाच्या व्हॉल्व्ह्जची उघडझाप करणारी यंत्रे, महत्वाचे लहान पंप, यांत्रिक दरवाजे, लिफ्ट्स, उजेडाची व्यवस्था अशा सर्व अत्यावश्यक गोष्टी न थांबता (अनइंटरप्टेड) निदान आठ तास तरी चालत राहतील एवढी क्षमता या बॅटरी बँक्समध्ये असते.

फुकुशिमा येथे भूकंपामुळे तेथील सर्व युनिट्स एका क्षणात बंद झाली आणि विजेचे टॉवर्स व तारांना क्षति पोचल्यामुळे बाहेरील वीजपुरवठासुध्दा थांबला. पण अपेक्षेप्रमाणे डिझेल जनरेटर्स लगेच सुरू झाले आणि रिअॅक्टर्सना थंड करण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर तासाभरात सुनामीची १४ मीटर उंच अशी प्रचंड लाट आली आणि ७ मीटर उंच असलेल्या संरक्षक भिंतीला ओलांडून ती पॉवर स्टेशनमध्ये घुसली. स्टेशनमधील सर्व डिझेल जनरेटर्स तळमजल्यावर किंवा तळघरात ठेवलेले असल्यामुळे सुनामीच्या दणक्याने त्या सर्वांची मोडतोड होऊन ते निकामी झाले. गरज पडल्यास एका युनिटमधून इतर युनिट्सना मदत करता येण्याची व्यवस्था असते, पण सहा युनिटसाठी केलेली सर्व व्यवस्था अशी एकाच वेळी नष्ट होईल अशी कल्पना मात्र कोणी केली नसेल. तसेच देशभर सगळीकडेच हाहाःकार उडालेला असल्यामुळे बाहेरूनसुध्दा कसलीही मदत मिळणे अशक्य झालेले होते.

रिअॅक्टरची कूलंट सिस्टिम बिल्डिंगच्या अनेक भागात बरीच पसरलेली असते. त्यात पंप, व्हॉल्व्ह, हीट एक्स्चेंजर्स, फिल्टर्स, पाइप्स, फिटिंग्ज वगैरे बरीच इक्विपमेंट्स असतात. कोणत्याही कारणाने त्यातल्या कशामधूनही पाण्याची गळती झाल्यास रिअॅक्टरला होणारा पाण्याचा पुरवठा खंडित होतो आणि त्याचे तपमान वाढायला लागते. अशा आणीबाणीच्या वेळी उपयोगी पडण्यासाठी खालील व्यवस्था रिअॅक्टरमध्ये केलेल्या आहेत.
हाय प्रेशर कोअर स्प्रे
लो प्रेशर कोअर स्प्रे
लो प्रेशर कूलंट इंजेक्शन
स्टँडबाय लिक्विड कंट्रोल सिस्टिम
ऑटोमॅटिक डिप्रेशरायझेशन
यातील प्रत्येक सिस्टिमसाठी वेगवेगळ्या टाक्यांमध्ये पाणी साठवून ठेवले असते. जशी आवश्यकता असेल त्याप्रमाणे क्रमाक्रमाने त्या सिस्टिम्स कार्यान्वित होतात आणि रिअॅक्टरला थंड करण्याचे काम करतात. या कामासाठी कधीही पाण्याचा तु़टवडा पडणार नाही हे विश्लेषणातून तसेच प्रात्यक्षिकांमधून सिध्द करावे लागते. मात्र हे काम करतांना कुठली ना कुठली वीज उपलब्ध असेल असे गृहीत धरावे लागते आणि त्याचीही भरपूर योजना केलेली असल्यामुळे ती नाही असे यापूर्वी कधी झाले नाही. पण यावेळची परिस्थिती अकल्पनीय अशी होती.

डिझेल जनरेटर्स बंद पडल्यानंतर बॅटरी बँक्सचे नक्की काय झाले हे माहीत नाही, पण एकाच वेळी सर्व रिअॅक्टर्सना मोठ्या प्रमाणावर पाण्याचा पुरवठा करणे त्याच्या आवाक्याबाहेरचे काम होते याची कल्पना होती. त्यामुळे लगेच आणीबाणीची घोषणा केली गेली आणि २० किलोमीटरच्या परिसरातील लोकांचे स्थलांतर करण्यात आले. तीनही रिअॅक्टरमधील तपमान वाढत गेले, त्यातून हैड्रोजन वायू तयार झाला आणि तो बाहेर पडून त्याचा स्फोट झाला हे माझ्या पहिल्या लेखात लिहिले होते. असा हैड्रोजन वायू कमी प्रमाणात तयार झाला असेल तर त्याला हवेत सोडण्यापूर्वीच एका बंद चेंबरमध्ये जाळून टाकण्याची व्यवस्था असते. इतर सारे सुरळीत चालले असते तर कदाचित हे काम सुनियंत्रित रीतीने करता येऊ शकले असते. पण हैड्रोजन वायूचा दाब इतका वाढला होता की त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते. त्याने रिअॅक्टर व्हेसलला फोडून बाहेर पडण्यापूर्वी त्याला बाहेर पडण्याची वाट मोकळी करून देणे भाग होते. त्यातून झालेल्या स्फोटामुळे बिल्डिंग्जची छपरे उडाली आणि भिंती कोसळल्या.

रिअॅक्टर्समध्ये हे महाभारत चालले असतांना त्याच्या शेजारी असलेल्या स्पेंट फ्यूएल पूलमधील पाणी थंड करणे तर थांबलेले होतेच, त्या पाण्याची वाफ होऊन त्याची पातळी खाली जातच होती. रिअॅक्टर क्रमांक ४ मध्ये मुख्य रिअॅक्टरपेक्षा या स्पेंट फ्यूएल पूलने जास्त उग्र रूप धारण केले. हा ओपन टँक असल्यामुळे त्यात प्रेशर वाढण्याचा प्रश्न नसला तरी तपमान वाढत जाणे धोकादायक होते. त्यामुळे त्या बिल्डिंगमध्ये आग लागली. नेहमीची अग्निशामक व्यवस्था चालत नसल्यामुळे हॅलिकॉप्टरमधून पाण्याचा वर्षाव करण्यात आला. एका युनिटमध्ये आलेला प्रॉब्लेम इतर ठिकाणीसुध्दा येण्याची शक्यता असल्यामुळे सगळीकडे पाणी टाकण्यात आले.

रिअॅक्टर किंवा स्पेंट फ्यूएल पूल अशा महत्वाच्या जागी अत्यंत शुध्द असे डिमिनरलाइज्ड पाणी वापरले जाते. पण ते तयार करणारी यंत्रणा तसेच त्याला नियोजित जागी नेण्यासाठी लागणारे पंप वगैरे उपलब्ध नसल्यामुळे बाहेरून तात्पुरते पंप आणि फायर इंजिन्स मागवून चक्क समुद्रातले पाणी उपसून सगळीकडे शिंपडण्यात येत होते. कारण काही केल्या रिअॅक्टरला होईल तितके निववायचे प्रयत्न करत राहणे भाग होते. या घाणेरड्या पाण्यामुळे सारी यंत्रे खराब होतील, त्यात मिठाचे थर साठतील, त्याचे भाग गंजतील, नंतर ती साफ करता येणार नाहीत वगैरेवर विचार करायलासुद्दा वेळ नव्हता इतकी तातडीची गरज होती.

जपानमधील परिस्थिती कोलमडलेली असल्यामुळे अमेरिकेतून मोठाल्या बार्जवरून पाणी आणले गेले आणि समुद्राच्या पाण्याऐवजी आता त्याचा वापर सुरू झाला आहे. तसेच अमेरिकेसह परदेशातून मोठमोठे पोर्टेबल पंप आले आहेत आणि ते पंप पाइपामार्फत जोडण्याचे प्रयत्न चालले आहेत. बेसमेंटमधले डिझेल जनरेटर्स सुरू करणे शक्यच नसल्यामुळे दोन तीन किलोमीटर नव्या केबल्स टाकून बाहेरून वीजपुरवठा करण्यात आला आहे. आता स्टेशनमधील सुस्थितीमध्ये असलेल्या पंपाना ती वीज पुरवण्यासाठी जोडणी करण्यात येत आहे. हे सगळे काम करण्यासाठी कामगारांना रिअॅक्टरच्या जवळ जावे लागते आणि रेडिओअॅक्टिव्हिटीच्या लेव्हल्स पाहून कमीत कमी वेळात होईल तेवढे काम करून परत फिरावे लागते. त्यामुळे त्यात अनपेक्षित असे अडथळे येतात.

रिअॅक्टरला थंड करण्यासाठी ओतलेले पाणी वाहून कुठे जाणार? एरवी संपूर्णपणे बंदिस्त अशा सिस्टिममध्ये त्याचे अभिसरण होत असते. पण आता बाहेरून टाकलेले पाणी खाली साचून त्याची डबकी बनणे अपरिहार्य आहे. आधीच सुनामीमुळे आलेले पाणी साठले होतेच त्यात नवी भर पडत आहे. या पाण्याला थेट समुद्रात नेऊन सोडता येत नाही. वाफ बनून हवेत आणि जमीनीतून झिरपत ते हळूहळू कमी होणार. रिअॅक्टरचे कंटेनमेंट अभेद्य राहिले तरी या मार्गाने काही रेडिओअॅक्टिव्ह द्रव्ये पर्यावरणात मिसळत आहेत. जसजसा वेळ जाईल तसतशी रिअॅक्टरमधील ऊष्णता कमी होत जाणार हे पाहता त्यावर पाणी शिंपडणे कमी करून त्याची डबकी साचण्यावर नियंत्रण केले जात आहे. अशा प्रकारचे अनेकविध प्रयत्न चालले आहेत.

देशभर जागोजागी रेडिओअॅक्टिव्हिटीची मोजणी करून तेथील पाणी किंवा अन्नपदार्थ खाण्यावर प्रतिबंध करण्यात येत आहेत. हवेमधून रेडिओअॅक्टिव्ह दूषित हवा शरीरात येऊ नये म्हणून तोंडावर मास्क लावणे, शक्य तोवर बंदिस्त घरातून बाहेर न पडणे यासारखे सुरक्षिततेचे उपाय योजले जात आहेत. आयोडीनच्या गोळ्या वाटल्या जात आहेत. या सगळ्यामुळे लोकांचे जीवन कठीण झाले आहे यात शंकाच नाही. पण सर्व अडचणींवर मात करून यातून बाहेर पडण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले आहे.

. . . . . . . . . . . . . . . . . (समाप्त)