Sunday, May 09, 2021

ज्ञान, विज्ञान, सायन्स आणि नॉलेज


या विषयांवर मी गेली बारा वर्षे अनेक वेळा लिहिले आहे. ते सगळे लिखाण या एका ठिकाणी संग्रहित करत आहे. माझ्या या सर्व लेखांमध्ये ज्ञान आणि विज्ञान या शब्दांचे अनुक्रमे सायन्स आणि नॉलेज एवढेच अर्थ मला अभिप्रेत आहेत. गीतेमधले परा, अपरा यासारखे शब्द माझ्या आकलनापलीकडले आहेत.

नवी भर दि.२५-०५-२०२१

अलीकडले लेखन

 'सायन्स' या इंग्रजी शब्दाला 'विज्ञान' हा प्रतिशब्द नेमका कुणी आणि केंव्हा सुचवला हे माहीत नाही. पण तो इतका रूढ झाला की विज्ञान आणि सायन्स या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे असे आपण समजतो. खरे पाहता सायन्स हा शब्द गेल्या काही शतकांमध्येच प्रचारात आला. त्यापूर्वी तो तत्वज्ञानाचा भाग होता आणि त्याला 'निसर्गाचे तत्वज्ञान' (natural philosophy ) असे नाव होते.  आज सायन्स या  इंग्रजी शब्दाला खूप अर्थ जोडला गेला आहे. या विश्वामधले सगळे पदार्थ, जीव आणि नैसर्गिक घटना यांची माहिती मिळवणे आणि ती सुसंगतपणे मांडणे असे त्याचे स्वरूप आहे.  तसेच त्याची व्याप्ती वाढत चालली आहे. हे विश्व जसे अमर्याद आहे आणि पसरत चालले आहे त्याचप्रमाणे विज्ञानसुद्धा वेगाने प्रसरण पावत चालले आहे. त्याला कुठलीही मर्यादा नाही.

विज्ञान हा शब्द प्राचीन काळापासून संस्कृत भाषेत आहे. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये 'ज्ञानविज्ञानयोग' या नावाचा एक संपूर्ण अध्याय आहे, त्यातल्या दुसऱ्या श्लोकात 'विज्ञान' हा शब्द एकदा येतो. पुढील अध्यायात त्याचा जास्त उलगडा केलेला दिसत नाही.  त्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की "मी तुला विज्ञानासह सर्व ज्ञान सांगेन आणि त्यानंतर जाणण्यासारखे काहीही शिल्लक राहणार नाही."  यावरून असे दिसते की विज्ञान हा ज्ञानाचा एक भाग आहे. पुढील श्लोकांमध्ये ते सांगतात की "पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश, मन, बुद्धि आणि अहंकार या माझ्या अपरा प्रकृति आहेत आणि ज्यामधून सर्व सजीवांचे धारण केले जाते ती माझी परा प्रकृति आहे." कदाचित यावरून असा अर्थ काढला जातो की परमेश्वराची अपरा प्रकृति म्हणजे विज्ञान आणि परा प्रकृति म्हणजे त्याच्या पलीकडचे ज्ञान. म्हणूनच अनेक विद्वान असे सांगत असतात की "जिथे विज्ञान संपते तिथे ज्ञान सुरू होते." 

. . . आणि तिथून वादाला सुरुवात होते.  

विज्ञान, शास्त्र आणि सायन्स या शब्दांमागे असलेल्या संकल्पनांमध्ये अंतर आहे असे मला सुचवायचे होते, ते कदाचित इथे थोडक्यात नीट व्यक्त झाले नसावे असे वाटते.

---

ज्ञान आणि नॉलेज

विज्ञान या संस्कृत शब्दाबद्दल जसा संभ्रम आहे त्यापेक्षाही मोठा घोळ 'ज्ञान' या शब्दाबद्दल आहे. 'माणसाला ज्या गोष्टींचे नीट आकलन झाले आहे आणि त्या त्याच्या लक्षात राहिल्या आहेत ते त्याचे ज्ञान' अशी माझी समजूत आहे. नॉलेज या शब्दाचाही अर्थ बहुधा असाच असावा. अभ्यास आणि अनुभव यातून माणसाच्या ज्ञानात वाढ होत असते. एका माणसाकडे असलेले ज्ञान त्याने इतरांना दिले तर त्याचा प्रसार होतो. पुस्तके आणि आताच्या काळातले इंटरनेट यावरूनही ज्ञानाचा प्रसार होतो. पण त्याने ते स्वतःजवळच ठेवले तर कालांतराने तो ते विसरून जाऊ शकतो आणि त्याचा ऱ्हास होतो. विविध क्षेत्रांमधल्या संशोधनांमधून रोज नवी नवी माहिती उजेडात येत असते आणि तिचा प्रसार होऊन जगातल्या एकंदर ज्ञानात भर पडत असते, त्याचप्रमाणे जुन्या झालेल्या ज्ञानाचा ऱ्हासही होत असतो. साहित्य, संगीत, इतिहास यासारख्या काही क्षेत्रांमध्ये आधीच्या पिढ्यांमध्ये होऊन गेलेल्या काही तपस्वी लोकांनी जन्मभर कष्ट घेऊन अपार ज्ञान संपादन केले होते असे मी ऐकत आलो आहे. त्यातला काही भाग त्यांनी ग्रंथांमध्ये लिहून ठेवलाही आहे. पण पुढील पिढ्यामध्ये कोणी अभ्यासू विद्यार्थी निघालाच नाही आणि ते ग्रंथ वाचले गेलेच नाहीत तर ते ज्ञान नष्ट होण्याच्या मार्गावर आहे असे मला वाटते. एक साधे उदाहरण घ्यायचे झाल्यास स्वयंपाकघरातले पदार्थ आणि घराच्या आजूबाजूला असलेल्या वनस्पती यांचे अनेक उपयोग माझ्या आईला माहीत होते. मला काही दुखणे आले की ती लगेच काहीतरी उगाळून, कुटून, ठेचून किंवा वाटून मला चाटवत असे आणि त्याने माझे दुखणे बरे होत असे. पण ते ज्ञान (किंवा ती माहिती) तिच्याबरोबरच नाहीसे झाले. मी आता वेगळी औषधे घेतो. अशा प्रकारे ज्ञानातसुद्धा स्थलकाळानुसार फरक पडत असतात.  नालंदाच्या ग्रंथसंग्रहालयात विविध विषयांवरले खूप ग्रंथ होते ते सगळे एका घटनेत नष्ट झाले हे आपण ऐकलेले आहेच. त्याखेरीज भारतभरामधील असंख्य जुने ग्रंथ आणि त्यातले ज्ञान काळाच्या ओघात लुप्त झाले आहेच.


हे सगळे 'नॉलेज'च्या बाबतीत ठीक आहे, पण 'ज्ञान' या शब्दाचा एक खूप वेगळा अर्थ सांगितला जातो. आध्यात्मिक वर्तुळांमध्ये वावरणाऱ्या लोकांच्या दृष्टीने आपण ज्याला ज्ञान (किंवा नॉलेज) म्हणतो तसल्या या नश्वर जगाच्या ज्ञानाला काही किंमतच नाही. त्यांच्या मते ज्ञान ही गोष्ट अशी पुस्तकातून किंवा इंटरनेटवरून मिळत नसते किंवा ती कुणाहीकडून शिकता येत नाही.  मनात अढळ निष्ठा ठेऊन तपस्या, साधना, समाधी वगैरे मार्गाने गेल्यावर ज्याला दिव्य साक्षात्कार होतो आणि आपल्याआप सगळे काही स्वच्छ समजायला लागते तो खरा 'ज्ञानी'.  मुख्यतः परमेश्वाराची किंवा मोक्षाची प्राप्ती हा त्या ज्ञानाचा उद्देश असतो. पुराणकालातील ऋषीमुनींपासून ते इतिहासकाळात किंवा अगदी कालपरवा होऊन गेलेल्या अनेक महात्म्यांना असे 'ज्ञान' प्राप्त झाले होते यावर श्रद्धा ठेवणारे अनेक सुबुद्ध लोक मला भेटलेले आहेत.  मी त्यांच्यावर अविश्वास दाखवू शकत नाही, पण मला त्याविषयी काही नॉलेज नाही.    

. .  नवी भर दि.२५-०५-२०२१:

मी पूर्वी एकदा 'देवाचे खाते' या नावाचा लेख लिहिला होता (http://anandghan.blogspot.com/2008/06/blog-post_29.html). मी त्यात असे लिहिले होते की माणसाला रोजच अनेक प्रश्न पडत असतात. अभ्यास आणि अनुभव यातून त्याला मिळणारे ज्ञानही वाढत असते. त्यातून त्याला काही प्रश्नांची उत्तरे मिळतात, काहींची मिळत नाहीत.  ज्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत ते "देव जाणे" असे म्हणून तो देवाच्या खात्यावर चढवून देतो. हे अनादि काळापासून चालत आले आहे. 

भारतीय तंत्रज्ञांनी प्राचीन काळातही बांधून ठेवलेली भव्य मंदिरे आणि ज्योतिषशास्त्र व आयुर्वेद या शास्त्रांमध्ये लिहून ठेवलेले आणि त्यातले आज उपलब्ध असलेले ग्रंथ पाहिले तर त्या लोकांनी विज्ञानाच्या क्षेत्रातही मोठी मजल मारली होती यात शंका उरत नाही. अर्थातच त्यांनी अनेक प्रश्नांची शास्त्रीय उत्तरे मिळवली असणार. पण मग त्यांनी संपादन केलेले हे ज्ञान मधल्या युगांमध्ये नाहीसे कसे झाले ? परकीय आक्रमणे आणि राजकीय अस्थैर्य ही कारणे असली तरी ती मला पुरेशी वाटत नाहीत कारण त्यानंतरही मंत्रतंत्र, स्तोत्रे वगैरे गोष्टी टिकून राहिल्या आणि आमच्या पिढीपर्यंत त्या पोचल्याच. मग विज्ञानाचा भाग का नाहीसा झाला ?  मी जे काही विज्ञान शिकलो ते पूर्णपणे पाश्चात्यांकडून आले आहे. तिथेसुद्धा दोन हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या आर्किमिडीज, पायथोगोरस वगैरेंच्यानंतर मधले दीड हजार वर्षे त्यात फारशी भर पडली नाहीच, पण गेल्या पाचशे वर्षात त्यात सातत्याने नवी भर पडत आली आहे. 

मी आज श्री.विनीत वर्तक यांचा एक लेख वाचला. त्यात त्यांनी असे लिहिले आहे की भारताच्या इतिहासातल्या मधल्या काळातल्या विद्वान लोकांनी "का?" या प्रश्नाचे उत्तर शोधणे सोडून दिले आणि ते परमेश्वरावर सोडून देऊन त्याच्या किंवा मोक्षाच्या प्राप्तीच्या मागे लागले. त्यामुळे ही उत्तरे शोधणारे पाश्चात्य जग विज्ञान आणि तंत्रज्ञानात पुढे जात राहिले. दुर्दैवाने आजही मला असे दिसते की बहुतेक लोक सगळे प्रश्न देवाच्याच खात्यात मांडतात. ते अधिक सोपे असते. लहानपणापासून मुलांच्या मनात असलेली जिज्ञासा प्रोत्साहन न मिळाल्यामुळे विरून जाते.         


---------------

पूर्वीचे लेख

----------

१. विज्ञान म्हणजे काय ?   

Friday, February 16, 2018



'विज्ञान' हा हजारो वर्षे जुना संस्कृत शब्द आहे. 'विशिष्ट ज्ञान' असा त्याचा व्यापक अर्थ आहे. पण अलीकडच्या काळात 'विज्ञान' या शब्दाचा उपयोग इंग्रजीमधील 'सायन्स' या शब्दाच्या अर्थाने प्रचलित झाला आहे. कुठल्याही विषयाच्या पध्दतशीर ज्ञानाला 'शास्त्र' असे म्हणतात, पण धर्म, न्याय, नीती वगैरेंमध्ये पारंगत असलेल्या माणसांना शास्त्री म्हणून ओळखले जाते आणि 'सायंटिस्ट' या शब्दाला प्रतिशब्द म्हणून 'शास्त्रज्ञ' हा शब्द योजला जातो 'विज्ञान', 'शास्त्रज्ञ' आणि 'तंत्रज्ञान' हे शब्द मी अनुक्रमे 'सायन्स', 'सायंटिस्ट' आणि 'टेक्नॉलॉजी' या अर्थाने या लेखामध्ये लिहिले आहेत.

विश्वामधील निर्जीव पदार्थ आणि सजीव प्राणिमात्र यांचा पध्दतशीरपणे केलेला अभ्यास म्हणजे विज्ञान (किंवा सायन्स) हा या शब्दाचा सोपा अर्थ आहे. तसा अभ्यास करूनच मानवाने त्यांचेमधील गुणधर्म आणि त्यात होत असलेल्या बदलांचे नियम समजून घेतले आणि त्यांचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेतला. हा अभ्यास आदिमानवाच्या काळापासून चालत आला आहे. प्राचीन भारतामध्ये एक अत्यंत विकसित आणि समृध्द अशी संस्कृती नांदत होती. असंख्य विद्वानांनी आणि शास्त्रज्ञांनी तिच्या प्रगतीला हातभार लावला होता. पण त्यांनी आपल्या नावांच्या नोंदी करून ठेवलेल्या नव्हत्या. कसलेही श्रेय स्वतःकडे घेण्याची कोणाची प्रवृत्तीच नव्हती. यामुळे त्या सर्व अनामिक शास्त्रज्ञांची ओळख आता उपलब्ध नाही.  इजिप्त, इराक, चीन, दक्षिण अमेरिका आदि भागांमध्येसुध्दा प्रगत संस्कृतींचे अवशेष मिळतात. त्यावरून तिकडल्या भागात झालेल्या विज्ञानामधील प्रगतीचा सुध्दा अंदाज घेता येतो.

कणाद ऋषींनी त्यांच्या वैशेषिक सूत्रामधून 'वैशेषिक' नावाचे तत्वज्ञान दिले होते. आगीच्या ज्वालांनी नेहमी वरच्या बाजूला जाणे आणि पावसाच्या पाण्याचे वरून खाली पडणे, पाण्याचे जमीनीवरून वहात जाणे अशा उदाहरणांवरून ते कशामुळे होत असेल असा विचार त्यात केला होता. निसर्गातील घटनांमध्ये कांही कार्यकारणभाव असतो असा विचार त्यात मांडला होता. विश्वामधील सर्व द्रव्ये अविभाज्य अशा सूक्ष्म कणांच्या संयोगामधून तयार झाली आहेत असे प्रतिपादन त्यांनी या चिंतनामधून केले होते, पण पुढे त्यांचा संबंध तत्वज्ञानाशी जोडला होता.  "मी जे शिकलो आणि प्रयोग करून सिध्द केले तेच मी या ग्रंथात लिहिले आहे. माझ्या शिष्यांनीसुध्दा स्वतःच्या अनुभवावरूनच त्यावर विश्वास ठेवावा." असे कांहीसे यशोधर नावाच्या विद्वानाने लिहिलेल्या ग्रंथात सांगितले होते. ही फक्त दोन उदाहरणे झाली. यातले विचार आधुनिक विज्ञानाच्या  जवळचे आहेत. "ईश्वराची करणी आणि नारळात पाणी" अशा प्रकारच्या श्रध्देच्या पलीकडे जाऊन या शास्त्रज्ञांनी निसर्गनियमांचा बारकाईने अभ्यास केला होता.

आर्यभट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य आदि विद्वानांनी कांही प्रत्यक्ष निरीक्षणे केली, त्यावर तर्कसंगत विचार केला आणि गणित व खगोलशास्त्रामधले अनेक सिध्दांत मांडले. त्यांच्या ग्रंथांमध्येसुध्दा विज्ञानाबरोबर तत्वज्ञानाचा समावेश आहे. त्यामधले कोणते ज्ञान ते गुरूकडून शिकले, कोणते त्या काळातल्या इतर विद्वानांनी सांगितले होते आणि त्यांनी स्वतः त्यात कशाच्या आधारावर कोणती भर घातली या सर्वांचे खुलासेवार तपशील आज मिळत नाहीत, त्यामुळे ब्रह्मगुप्ताने किंवा वराहमिहिराने स्वतःच अमूक अमूक शोध लावले असे आज कदाचित ठामपणे सांगता येणार नाही. पण रूढ विचारांपेक्षा वेगळा विचार करणे आणि तो आपल्या रचनांमध्ये मांडणे याचे भारतामधील विद्वानांना स्वातंत्र्य होते हे त्यातून सिध्द होते. हे वातावरण विज्ञानाच्या प्रगतीला पोषक होते, पण या प्राचीन विद्वानांच्या वैज्ञानिक विचारांचा प्रसार मधल्या काळात कुठे तरी थांबला, त्यांनी दिलेल्या विज्ञानात नवी भर पडली नाही आणि त्यांचे मौलिक विचारही इथल्या जनमानसात आणि पारंपरिक शिक्षणपध्दतीत रुजले नाहीत. त्यांचे विज्ञान तत्वज्ञानात गुरफटलेले राहिले आणि झाकले गेले.  कित्येक शतकानंतर अलीकडच्या काळात ते थोडे थोडे करून उजेडात येत आहे.

 युरोपमधील अॅरिस्टॉटल, टॉलेमी आदि जुन्या ग्रीक विचारवंतांनी मांडलेले विज्ञानविषयक विचारसुध्दा त्यांच्या तत्वज्ञानातले भाग होते. निसर्गाच्या नियमांचा अभ्यास हा 'नॅचरल फिलॉसॉफी' या नावाने ओळखला जात होता. कोपरनिकस, गॅलीलिओ, पास्कल आदि मध्ययुगामधील शास्त्रज्ञांनी त्याच नावाने आजच्या सायन्स या विषयाचा अभ्यास केला होता. पण त्यांनी धीटपणे कांही नवे विचार मांडले. त्या काळातल्या ख्रिश्चन धर्मगुरूंनी त्यांच्या क्रांतिकारक विचारांना विरोध केल्यामुळे कांही शास्त्रज्ञांना छळही सोसावा लागला. त्यानंतर हे चित्र हळूहळू बदलत गेले. प्रत्यक्ष प्रमाणावर म्हणजे डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा या माणसाच्या पाच ज्ञानेंद्रियांकडून प्राप्त होणा-या ज्ञानावर जास्त विश्वास ठेवायला हवा, ती नवी माहिती रूढ समजुतींशी विसंगत असली तर त्या समजुती तपासून पहायला हव्यात, गतकाळातल्या विद्वानांनी जे सांगितले होते तेवढेच बरोबर असा अट्टाहास असू नये असे विचार पाश्चात्य समाजामधल्या विचारवंतांनी मांडायला सुरुवात केली. सर फ्रान्सिस बेकर या इंग्रज माणसाने कुठलाही महत्वाचा शोध लावला नसला तरी त्याने वैज्ञानिक पध्दतीचा पुरस्कार करून विज्ञानयुगाचा पाया घालण्यात जो मोलाचा वाटा उचलला त्यामुळे विज्ञानाच्या इतिहासात त्याचे नाव आदराने घेतले जाते.

 दोन तीन शतकांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये विज्ञानाला तत्वज्ञानापासून वेगळे करण्यात आले. निसर्गनियमांचा अभ्यास अशी सायन्स या नावानिशी त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली.  या जगात दोन प्रकारचे नियम असतात, मानवनिर्मित आणि निसर्ग निर्मित. मानवनिर्मित नियम किंवा कायदे कालानुसार बदलतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असू शकतात. निसर्गाचे नियम सर्वांना लागू होतात. हे निसर्गनियम आणि नैसर्गिक पदार्थांचे गुणधर्म चिरकाल टिकणारे असतात.

विज्ञानाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ निसर्गाचे नियम आणि पदार्थांचे गुणधर्म फक्त समजून घेऊ शकतात, ते स्वतः नवे नियम तर करू शकत नाहीतच, त्यात कणभरसुध्दा बदल करू शकत नाहीत.  हे वैज्ञानिक निसर्गाचा अभ्यास करून त्यांना जे सत्य दिसेल, जाणवेल, जे आकलन होईल ते पध्दतशीरपणे मांडतात. विज्ञानामधील शोध, सिध्दांत, नियम वगैरे प्रयोगामधून सिध्द करता येण्यासारखे असतात. विज्ञानामध्ये तर्कशुद्ध विचाराला महत्व असते. कुठल्या तत्वाचा कोणी शोध लावला यापेक्षा तो कसा सिद्ध केला गेला हे महत्वाचे असते. सिध्दांतामागे असलेले विचार  किंवा प्रयोगामधून केलेली निरीक्षणे यांचा सखोल अभ्यास करून त्यावरून निष्कर्ष काढले जातात.  त्यांचे काम सिध्दांत, निरीक्षण, परीक्षण, विश्लेषण आणि त्यामधून निघणारे निष्कर्ष अशा क्रमवार पध्दतीने सुसंगतपणे मांडले जाते. इतर तज्ज्ञ त्यावर साधक बाधक विचार आणि चर्चा करतात, त्यांच्या मनातल्या शंका मांडतात, त्यांचे निरसन झाल्यानंतरच ते मान्य केले जाते. अशा प्रकारची वैज्ञानिक पध्दत आज जगभर रूढ झाली आहे.

 प्रयोग करतांना किंवा एरवीसुध्दा अनेक वेळा अनपेक्षित किंवा धक्कादायक अनुभव येतात, त्यामागे असलेली शास्त्रीय कारणे आपल्याला माहीत नसली तरी ती असतात. ती शोधून काढण्यामधूनच विज्ञानात प्रगति होत जाते.

विज्ञानाच्या विकासाबरोबरच तंत्रज्ञानात सुधारणा होत गेल्या. प्रयोग करण्यासाठी नवनवी साधने आणि उपकरणे तयार होत गेली. उदाहरणार्थ दुर्बीण आणि सूक्ष्मदर्शक यंत्रांमुळे मानवी दृष्टीने पहाण्याची क्षमता अनेकपटीने वाढली. अंतर, आकार, वजन, वेळ आदि गोष्टी मोजण्याची साधने खूप पूर्वीपासून उपयोगात आणली गेली होती आणि त्या गणनांचा उपयोग करण्यासाठी गणितशास्त्राचा विकास झाला होता. विज्ञानामध्ये नेमकेपणाला महत्व असल्यामुळे सर्व मोजमापे अचूक असावी लागतात. जसजसे नवे शोध लागत गेले त्याबरोबरच नवनवी उपकरणे तयार केली गेली आणि त्या उपकरणांचा दर्जा सुधारत गेला. उदाहरणार्थ विजेचा शोध लागल्यावर तिचा दाब (व्होल्टेज), प्रवाह (करंट), प्रतिरोध (रेझिस्टन्स) वगैरे मोजण्याची गरज पडली आणि त्यासाठी इन्स्ट्रुमेंट्स तयार झाली. अधिक क्षमता असलेल्या चांगल्या उपकरणांच्या सहाय्याने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेगही झपाट्याने वाढत गेला.

काळाबरोबर विज्ञानाची एक परिभाषा तयार झाली आहे आणि त्यातील प्रत्येक संज्ञेची स्पष्ट व्याख्या केली जाते. उदाहरणार्थ फोर्स, प्रेशर, स्ट्रेस हे इंग्रजी शब्द वाङमयामध्ये कदाचित एकसारखे वाटत असले तरी विज्ञानाच्या परिभाषेत त्यांना विशिष्ट अर्थ आहेत, तिथे एका शब्दाच्या ऐवजी दुसरा शब्द वापरता येत नाही. सूत्रे आणि समीकरणे मांडण्यासाठी या संज्ञांना काही चिन्हे दिली आहेत, त्यांच्या गणनेसाठी एकके (युनिट्स) ठरवली गेली आहेत आणि त्यांचे जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर मानकीकरण (स्टँडर्डायझेशन) झाले आहे. अशा प्रकारे आजचे विज्ञान खूप पध्दतशीर आणि नियमबध्द झाले आहे.

प्रयोग करतांना किंवा एरवीसुध्दा अनेक वेळा विसंगत, अनपेक्षित किंवा धक्कादायक अनुभव येतात, त्यामागे असलेली शास्त्रीय कारणे आपल्याला त्या वेळी माहीत नसतात. ती चिकाटीने शोधून काढण्यामधूनच विज्ञानात प्रगति होत जाते. अंतर्ज्ञान, साक्षात्कार, दृष्टांत, चमत्कार यासारख्या संकल्पनांचा विज्ञानाच्या मुख्य प्रवाहामध्ये समावेश होत नाही. ज्ञानेंद्रियांच्या मदतीशिवाय मिळणा-या अगम्य आणि अतींद्रिय ज्ञानाचा अभ्यास 'एक्स्ट्रा सेन्सरी पर्सेप्शन' (ईएसपी) या नावाखाली केला जातो. विज्ञानाच्या निकषांमध्ये बसणारे आणि सर्वमान्य होतील असे नवे शोध त्या अभ्यासातून लागले तर त्यांचा समावेश विज्ञानात केला जाईल.

प्राचीन काळापासून ते आज प्रचलित असलेल्या विज्ञानाचे स्वरूप अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न मी या लेखात केला आहे.

--------------------------------------------------------------------------------------

२. प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ

Wednesday, February 28, 2018

यावरील एक चित्रमय लेख सुमारे दहा वर्षांपूर्वी ई मेल्सवर फिरत होता. त्या माहितीपूर्ण लेखातला काही भाग अतिरंजित आणि काही भाग कपोलकल्पित असल्यामुळे त्या वेळी मला तो फारसा विश्वसनीय वाटला नव्हता. पण त्या लेखामुळे माझ्या मनातली जिज्ञासा जागृत झाली आणि मी आंतर्जालावर थोडे उत्खनन करून सहजपणे मिळेल तेवढी माहिती गोळा केली. त्या माहितीच्या आधारावर थोर भारतीय शास्त्रज्ञ या नावाची एक लेखमाला मी पांच भागात लिहून प्रकाशित केली होती.

महान भारतीय शास्त्रज्ञ - भाग १, २, ३, ४ आणि ५

http://anandghan.blogspot.in/2008/05/blog-post.html

http://anandghan.blogspot.in/2008/05/blog-post_02.html

http://anandghan.blogspot.in/2008/05/blog-post_9750.html

http://anandghan.blogspot.in/2008/05/blog-post_03.html

http://anandghan.blogspot.in/2008/05/blog-post_05.html

मला त्यानंतरच्या काळात या विषयावरील अनेक लेख आणि साधक बाधक चर्चा वाचायला मिळाली. या वर्षी पुण्यात भरलेल्या आंतरराष्ट्रीय वेद विज्ञान परिषदेच्या प्रदर्शनाला भेट देऊन तिथून आणखी काही माहिती आणि चित्रे मिळवली. याच सुमारास मला शिक्षण विवेक या मासिकासाठी एक लेख लिहिण्याबद्दल विचारणा करण्यात आली. या दृष्टीने माझी तयारी सुरू असल्यामुळे मी त्यांना लगेच होकार दिला आणि हा लेख लिहून दिला. मी तयार केलेली सर्व चित्रे त्या मासिकामध्ये जागेअभावी दिली गेली नव्हती. मी या अनुदिनीमध्ये त्यांचा समावेशसुध्दा केला आहे. त्यामधून माझ्या लेखाचा विषय अधिक स्पष्ट होऊ शकेल.

ओळख प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांची

 प्राचीन भारतामध्ये एक अत्यंत विकसित आणि समृध्द अशी संस्कृती नांदत होती. तिच्या प्रगतीला असंख्य विद्वानांनी हातभार लावला होता, त्या सर्व अनामिक शास्त्रज्ञांची नोंद आता उपलब्ध नाही. काही शास्त्रज्ञांनी लिहिलेले ग्रंथ किंवा संहिता त्यांच्या नावानिशी माहीत आहेत. प्राचीन भारतीयांनी निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीचा थोडक्यात आढावा घेऊन त्यानंतर या थोर शास्त्रज्ञांची ओळख करून देण्याचा अल्पसा प्रयत्न या लेखात मी केला आहे. हे सारे विद्वान थोर पुरुष होते, त्यांच्याकडे अचाट बुध्दीमत्ता व विचारशक्ती होती, अगाध ज्ञान होते आणि त्यांनी त्यांच्या काळात असामान्य असे कर्तृत्व करून दाखवले होते. कोणाही भारतीय माणसाला त्यांच्याबद्दल आदर वाटावा आणि स्वतःच्या भारतीयत्वाचा अभिमानही वाटावा असे ते शास्त्रज्ञ होते.

आपले पूर्वज सोने, चांदी, लोखंड, तांबे आणि त्यांचे मिश्रधातू यांचा उपयोग करत होते. हे धातू तयार करण्यामध्ये खाणकाम (Mining), रसायनशास्त्र (Chemistry) आणि धातुविज्ञान (Metallurgy) या विद्यांचा भरपूर विकास प्राचीन भारतामध्ये झाला होता. अनेक प्रकारच्या रासायनिक क्षारांची निर्मिती करायच्या प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारी उपकरणे त्यांनी विकसित केली होती. प्राणी आणि वनस्पतींचा सखोल अभ्यास करून त्यांचा उपयोग करण्याची शास्त्रे त्यांनी लिहिली होती. खगोलशास्त्रामध्ये त्यांनी प्राविण्य मिळवले होते आणि त्यासाठी गणिताचे ज्ञान आवश्यक होतेच. शरीर आणि मनाचे आरोग्य सांभाळण्यासाठी त्यांनी निर्माण केलेली आयुर्वेद आणि योग ही शास्त्रे आजही अत्यंत उपयुक्त आहेत. वास्तुशास्त्रामध्ये घरे, मंदिरे इत्यादि बांधण्यासाठी स्थापत्यशास्त्राचे नियम तयार केले. त्यांच्या आधारे बांधलेली भव्य प्राचीन मंदिरे त्याची साक्ष देतात. संस्कृत ही जगातली सर्वात जुनी अशी व्याकरणबध्द आणि अद्भुत भाषा आहे. तिच्यात विशाल शब्दभांडार आहेच, शिवाय कालमानानुसार नवनवे अर्थपूर्ण शब्द निर्माण करायची क्षमता आहे.



आचार्य चरक  यांना वैद्यकीय शास्त्राचे जनक आणि आचार्य शुश्रुत यांना शल्यचिकित्सेचे जनक  मानले जाते. त्यांनी लिहिलेल्या चरकसंहिता आणि सुश्रुतसंहिता हे आयुर्वेदाचे पायाभूत ग्रंथ आहेत. आजचे वैद्यराजही त्यांच्या आधारे चिकित्सा आणि उपचार करतात. चरकमहर्षींनी व्याधींचा प्रतिबंध, निदान आणि निवारण या तीन्हीबद्दल लिहिले आहे.  रोगावर उपाय करण्यापेक्षा तो न होऊ देणेच अधिक चांगले "Prevention is better than cure" हे तत्व त्यांनी सांगितले होते. शरीरामधील कफवातपित्त हे त्रिदोष, रक्त, मांस, मज्जा, अस्थि वगैरे सप्तधातु, अन्न आणि औषधे यांचा त्यांचेवर होणारा परिणाम ही आयुर्वेदाची मूळ तत्वे त्यांनी सांगितली. शरीरपरीक्षा, मानसपरीक्षा आणि सारासारतत्व अशा रोगाचे निदान करण्याच्या पध्दती, त्यावर करण्याचे उपचार, वनस्पतीजन्य आणि रासायनिक औषधे वगैरे सर्वांबद्दल त्यांनी लिहिले.  सुश्रुतमहर्षीं हे अत्यंत कुशल असे शल्यविशारद (सर्जन) होते. निरनिराळ्या शस्त्रक्रियांसाठी उपयुक्त अशा खास प्रकारच्या सुया, चिमटे आणि चाकू आदि हत्यारे त्यांनी तयार करून घेतली होती. हाडे, त्वचा (प्लॅस्टिक सर्जरी) आणि डोळे (मोतीबिंदू) वगैरेंच्या शस्त्रक्रियांसंबंधी सविस्तर माहिती त्यांच्या संहितांमध्ये दिली आहे. आज अधिक चांगल्या आधुनिक सोयी उपलब्ध आहेत, त्यामुळे सश्रुतसंहितेनुसार शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत, पण आयुर्वेदिक पध्दतीने उपचार केले जातात. सुश्रुतसंहितेमध्ये शल्यचिकित्सेशिवाय आयुर्वेदासंबंधी पुष्कळ माहिती आहे. शेकडो प्रकारचे रोग, औषधी वनस्पती आणि अनेक प्रकारची प्राणीजन्य व रासायनिक औषधे यांची माहिती त्यात आहे. महर्षी पतंजलि यांनी शरीर आणि मन निकोप आणि सुदृढ करण्यासाठी अष्टांग योग सांगितले होते. त्यामधील योगासने आणि प्राणायाम आज जगभरात लोकप्रिय झाले आहेत आणि कोट्यावधि लोक त्याचा लाभ घेत आहेत.

 आर्यभट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त व भास्कराचार्य आदि महान शास्त्रज्ञांनी खगोलशास्त्र व गणितशास्त्रामध्ये फार मोठे काम करून ठेवले आहे. त्यांच्या ग्रंथांवर इतर विद्वानांनी भाष्य किंवा टीका लिहिल्या होत्या, तसेच त्यांचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले होते आणि हे ज्ञान अरब विद्वानांमार्फत पाश्चात्य देशात गेले होते. आर्यभटांनी अंकगणित, बीजगणित, भूमिती आणि त्रिकोणमिती या सर्वांमध्ये आपली छाप उमटवली. त्यांनी शून्याची कल्पना मांडली, बीजगणितामधील समीकरणे सोडवली, पाय (π) या आकड्याचे ३.१४१६ इतके अचूक मूल्य काढले,  त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र सांगितले आणि ज्या, कोज्या (साइन, कोसाइन) यांची  संकल्पना मांडून त्यांची कोष्टके तयार केली. आर्यभटांनी खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी शंकुयंत्र, छायायंत्र, धनुर्यंत्र, चक्रयंत्र, छत्रयंत्र यासारखी विविध उपकरणे तयार केली आणि त्यांचा उपयोग करून आकाशातील ग्रहता-यांची अत्यंत सूक्ष्म अशी निरीक्षणे केली. पृथ्वी गोलाकार असून तिचा परीघ किती आहे आणि ती स्वतःभोवती फिरते असे सांगितले, सूर्य आणि चंद्रग्रहणे कशामुळे होतात त्याचा शोध लावला आणि ती कधी व केंव्हा होतात याचे अचूक गणित मांडले. पंचांग तयार करण्यासाठी आर्यभट, भास्कराचार्य आदींनी दिलेल्या खगोलशास्त्रीय गणिताचा उपयोग शतकानुशतके होत राहिला.



वराहमिहिर यांनी विपुल ग्रंथरचना करून आर्यभटादि शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन पुढे नेले. गणिताच्या ज्ञानात स्वतःची भर घातलीच, प्रकाशाचे परावर्तन कसे होते यावर विचार मांडले. जमीनीवरील सर्व वस्तूंना जमीनीशी जखडून ठेवणारी एक अद्भुत शक्ती आहे असे प्रतिपादन करून एका अर्थी गुरुत्वाकर्षणाचे सूतोवाच केले.  ब्रह्मगुप्त यांनीही गणितावर खूप महत्वाचे संशोधन केले. त्यांनी इतर आंकड्यांची शून्याबरोबर बेरीज, वजाबाकी व गुणाकार करण्याचे नियम सांगितले. ऋणसंख्या ही नवी संकल्पना मांडली. त्यानंतर अंकगणिताचे स्वरूपच बदलून गेले. ब्रह्मगुप्त यांनी भूमितीमधील आकारांची क्षेत्रफळे आणि बीजगणितामधील समीकरणांची उत्तरे काढण्याची सूत्रे मांडली. या तीन शास्त्रज्ञांच्या काळानंतर सुमारे चारपाचशे वर्षांनी द्वितीय भास्कराचार्य हे अद्वितीय शास्त्रज्ञ होऊन गेले. सामान्य बुद्धीच्या गणकांना बोधकर होईल आणि चतुर व ज्ञानी गणकांच्या मनात प्रीती उत्पन्न करेल असा ‘सिद्धान्तशिरोमणी’ हा ग्रंथ या भास्कराचार्यानी लिहिला. त्यात लीलावती, बीजगणित, गणिताध्याय आणि गोलाध्याय असे चार भाग आहेत. त्याशिवाय त्यांनी आणखी काही विद्वत्तापूर्ण ग्रंथ लिहिले. पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर सहा महिने रात्र आणि सहा महिने दिवस असतात. चंद्रावर पंधरा पंधरा दिवसांचे दिवसरात्री असतात, हे भास्कराचार्याना माहीत होते. ग्रहांचे भ्रमणकाळ आणि त्यांच्या दैनंदिन गती यांच्या अचूक किंमती त्यांनी काढल्या. ग्रहणाच्या वेळी सूर्य आणि चंद्र यांची तात्कालिक गती काढण्यासाठी कॅलक्युलससारखे सूत्र वापरावे लागते ते त्यांनी तेव्हा वापरले होते. भास्कराचार्य केवळ सैद्धांतिक खगोलशास्त्रज्ञ नव्हते तर ते उत्तम आकाश निरीक्षक होते.

या शास्त्रज्ञांखेरीज कणाद मुनि आणि नागार्जुन यांची नांवेही आदराने घेतली जातात. जगामधील सर्व पदार्थ सूक्ष्म अशा कणांमधून बनले आहेत असे प्रतिपादन कणाद मुनींनी केले होते. नागार्जुनांनी रसायनशास्त्राचे खूप प्रयोग केले. त्यांना अपेक्षित होते त्याप्रमाणे हिणकस धातूंचे सोन्यामध्ये रूपांतर करता आले नाही, पण त्या प्रयत्नात त्यांनी तसे चमकणारे अनेक नवे मिश्रधातु तयार केले आणि अनेक प्रकारची रासायने व रासायनिक क्रियांसाठी लागणारी विशेष उपकरणे तयार करून घेतली. या रसायनांचा उपयोग धातुशास्त्र आणि औषधांसाठीसुध्दा केला जात असे. बाराव्या शतकात भास्कराचार्यांनी लिहिलेल्या सिध्दांतशिरोमणी या ग्रंथानंतर शास्त्रज्ञांची परंपरा खंडित झाली ती कायमचीच. त्यानंतर अनेक शतकांच्या कालानंतर पुन्हा त्यांचे कांही ग्रंथ उजेडात आले, बरेचसे नष्ट झाले. आज जेवढी माहिती सहज उपलब्ध आहे त्यावरून त्यांच्या कार्याचा फक्त अंदाज घेता येतो.



या भारतीय शास्त्रज्ञांनी आपली सगळी ग्रंथरचना संस्कृत भाषेत काव्यबध्द केली आहे. त्या प्रयत्नात शास्त्रीय माहितीचा नेमकेपणा रहात नाही आणि ती समजणे कठीण होते. शिवाय संस्कृत भाषेमधील पंडितांना विज्ञान माहीत नसते आणि विज्ञान शिकलेल्यांना संस्कृत भाषा समजत नाही, कालमानानुसार आणि संदर्भाप्रमाणे शब्दांचे अर्थ बदलतात अशा अनेक अडचणी आहेत. प्राचीन काळात कुठल्याही विधानाचा शास्त्रीय आधार दाखवण्याची पध्दत नसावी. त्यामुळे सिध्दांत मिळतात, पण त्यांची सिध्दता नाही, आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास 'फॉर्म्युले' मिळतात पण त्यांचे 'डेरिव्हेशन' मिळत नाही. यामुळे ते संशोधन आज प्रचलित असलेल्या वैज्ञानिक पध्दतीनुसार स्पष्ट होत नाही. तरीही सारांशरूपाने सांगायचे झाल्यास प्राचीन काळातल्या भारतीय शास्त्रज्ञांनी नेत्रदीपक अशी कामगिरी करून ठेवली आहे. ती डोळसपणाने समजून घेतल्यास नक्कीच स्फूर्तीदायक आहे.

---------------------------------------------------------------------

३. विज्ञान, अज्ञान आणि अंतर्ज्ञान      

 Wednesday, August 27, 2008

पाण्यात दगड टाकला तर तो बुडतो, पण लाकूड पाण्यावर तरंगते, जमीनीवर पडलेला दगड त्याला कोणी ढकलले, ओढले किंवा उचलले तरच तो जागेवरून हलतो, नाही तर जागीच पडून राहतो, सरळ वर उचलून सोडलेला दगड त्याच जागी खाली येतो आणि समोर भिरकवलेला दगड थोड्या अंतरावर जाऊन खाली पडतो वगैरे निसर्गात घडणा-या अनंत गोष्टी अशिक्षित माणसालासुध्दा अनुभवाने समजलेल्या असतात.

आदिमानवाच्या काळापासून माणसाला त्या माहीत होत्या. जग हे असेच असते असे समजून सहसा त्यावर कोणी जास्त विचार करत नाही. आर्किमिडीज आणि न्यूटन वगैरेंसारख्या विद्वानांनी असा विचार केला आणि त्यातून निसर्गाचे कांही मूलभूत नियम शोधून ते सूत्रांच्या किंवा समीकरणांच्या रूपात जगापुढे मांडले. त्या शोधांची नोंद त्यांच्या नांवावर झाली. अशा प्रकारच्या अनेक अनुभवांचा, निरीक्षणांचा आणि त्यावरून काढलेल्या निष्कर्षांचा विचार करून जे सिध्दांत मांडले गेले त्या सर्वांना एकमेकांशी प़डताळून पाहिल्यानंतर त्यातले कांही सर्वमान्यता पावले. त्यांचा एकत्रित विचार करून त्यातून एक शास्त्र बनत गेले. त्याला 'सायन्स' असे नांव दिले गेले. परीक्षण, निरीक्षण, विश्लेषण आणि निष्कर्ष या पध्दतीने अधिकाधिक माहिती मिळवण्याचे एक प्रभावी तंत्र बनले, ते 'सायंटिफिक मेथड' या नांवाने प्रचारात आले. इंग्रजांनी सुरू केलेल्या शिक्षणपध्दतीतून भारतात आल्यावर 'सायन्स'ला मराठीत 'विज्ञान' या नांवाने संबोधले गेले आणि आजही जात आहे.

वैज्ञानिक पध्दतींचा उपयोग करून माहिती मिळवतांनासुध्दा शारीरिक ज्ञानेंद्रियांच्या मर्यादा आड येतातच. जगात जे कांही अस्तित्वात असते वा घडत असते त्यातला अत्यंत थोडा भागच आपल्या ज्ञानेंद्रियांना जाणवतो. त्यापलीकडे खूप कांही असते. शिवाय आरशात दिसलेले प्रतिबिंब म्हणजे खरी वस्तू नसते किंवा परावर्तनातून आलेला प्रतिध्वनी मूळ आवाज नसतो. त्यामुळे जे जाणवते त्यातलासुध्दा कांही भाग शंकास्पद असतो. यातून मार्ग काढण्यासाठी बुध्दीचा उपयोग करावा लागतो. उदाहरणार्थ सूर्य पूर्वेला उगवतांना डोळ्यांना दिसतो पण तो एका जागेवर स्थिर आहे आणि आपण फिरत आहोत अशी कल्पना मनाने करावी लागते. अगणित विद्वानांनी अशा विविध कल्पना करून त्यांच्या आधारे निरनिराळे सिध्दांत मांडले आणि तर्काने व प्रयोगाने त्यांची सत्यता पटवली.

न्यूटन, पास्कल वगैरे पूर्वीच्या काळातल्या शास्त्रज्ञांनी मांडलेले सिध्दांत अशा प्रकाराने प्रयोगशाळेत सिध्द केले गेले आणि आजही विज्ञानाच्या प्राथमिक शिक्षणासाठी शाळाकॉलेजांमधून ते करून दाखवले जातात. त्यांच्या आधारावर निसर्गातल्या अनेक घटनांचे तसेच विविध पदार्थांच्या गुणधर्मांचे अर्थ समजून घेता आले आणि त्या माहितीचा उपयोग करून नवनवी साधने व यंत्रे बनवण्यात आली. यातून यंत्रयुग सुरू होऊन त्याचा विकास होत गेला. पण कांही निरीक्षणांचे स्पष्टीकरण जुन्या सिध्दांतातून समाधानकारकरीत्या होत नव्हते. ते समजून घेण्यासाठी नवनव्या संकल्पना मांडल्या गेल्या आणि त्यांच्या आधारे तर्कशुध्द विचाराने नवे सिध्दांत मांडले गेले. अणुपरमाणूंची आंतरिक रचना, सापेक्षता सिध्दांत यासारख्या गोष्टी डोळ्यांना किंवा कानाला जाणवू शकत नाहीत, पण त्या तशा आहेत असे गृहीत धरून गणिताच्या आधाराने अनेक दृष्य परिणामांचे स्पष्टीकरण देता येते. विज्ञानातल्या या संकल्पनांनादेखील शंभरावर वर्षे होऊन गेली आहेत. पण त्या नीट समजण्यासाठी उच्च दर्जाच्या गणिताची बैठक तसेच जेवढी कुशाग्र बुध्दीमत्ता लागते त्यांची अपेक्षा सर्वसामान्य लोकांकडून करता येणार नाही. त्यामुळे शाळेत शिकवले जाणारे बहुतेक विज्ञान निदान शंभर वर्षे जुने असते. त्यानंतर झालेल्या विज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीबद्दल सामान्य लोकांना फारसे माहीत नसते.

असे असले तरी नवनव्या संशोधनाच्या आधाराने ज्या तंत्रज्ञानाचा विकास होतो त्याचा फायदा सामान्य लोकांना मिळतोच. पूर्वीच्या काळात तलवारबाजीत निपुण असलेल्या वीराला पोलाद कसे बनते ते ठाऊक असण्याची गरज नव्हती, पण कणखर पोलादाची तलवार चालवून तो पराक्रम गाजवू शकत असे. त्याचप्रमाणे हातात मोबाईल धरणा-या माणसाला त्यातल्या मायक्रोप्रोसेसर चिपसंबंधी कांहीही माहिती नसली तरी तो त्या साधनाचा उपयोग करून कोणाशी बोलू शकतो, फोटो काढू शकतो, गाणे ऐकू शकतो आणि आता इंटरनेटसुध्दा पाहू शकतो. हे सगळे कसे साध्य होते याबद्दल मात्र तो अनभिज्ञच असतो. आज ज्या वेगाने विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात रोज नवी भर पडत आहे तो कोणत्याही माणसाच्या आकलनशक्तीच्या असंख्यपटीने अधिक आहे. वैज्ञानिकांच्या विनयामुळे म्हणा किंवा सत्यपरिस्थितीच्या जाणीवेमुळे ते नेहमीच आपण एक प्रवासी आहोत असे सांगत असतात. विज्ञानातल्या सिध्दांतांबद्दल थोडी अनिश्चितता बाळगतात. आज हे असे दिसते आहे, उद्या काय दिसेल ते सांगता येत नाही असा सूर लावतात. या सर्वांमुळे विज्ञानाबरोबरच त्याविषयीचे अज्ञान आणि अविश्वास जास्त वाढत चालले आहेत की काय असे कधीकधी वाटते.

मला असे वाटते की अज्ञान हे अमावास्येच्या रात्रीतल्या काळोखासारखे अथांग असते. आपण आपल्या ज्ञानाच्या पणतीच्या उजेडात आपल्या आसपासच्या कांही गोष्टी पाहू शकतो. यात आणखी अशी गंमत आहे की आपल्या शेजारी एकादा माणूस हजार वॉटचा दिवा लावून लख्ख उजेडात बसला असला तरी आपल्याला तो प्रकाश दिसत नाही. आणखी दूरवर पहायचे असेल तर ज्याने त्याने स्वतःच्या पणतीतली वातच मोठी करावी लागते. त्यामुळे विज्ञानाच्या प्रसाराबरोबर त्यासंबंधीचे अज्ञान आणि अविश्वास आपोआप दूर होईल अशी भाबडी आशा बाळगणा-यांची निराशा होते.

आज बहुतेक लोकांच्या घरी टीव्ही, कॉम्प्यूटर आणि खिशात मोबाईल असतात. त्यातल्या प्रत्येक साधनातून तो चित्रे पाहू शकतो आणि ध्वनी ऐकू शकतो. जगभरातून असंख्य ठिकाणांहून आणि अगणित लहरींच्या माध्यमामधून या संदेशांचे प्रसारण होत असते. त्यातले त्याला हवे ते संदेश त्याचे यंत्र ग्रहण करते, पण इतर असंख्य विद्युतचुंबकीय लहरीसुध्दा त्याच्या किंवा आपल्याही आसपास आणि आरपार सारख्या वहातच असतात. पण आपल्याला त्याचा पत्ता नसतो. आपण त्याबद्दल पूर्णपणे अज्ञानाच्या अंधारात असतो.

मात्र अदृष्यपणे येणारे संदेश आपल्याला समजतात असा कांही लोकांचा दावा असतो, किंवा त्यांना ती विद्या प्राप्त आहे अशी इतर लोकांची त्यांच्याविषयी समजूत असते. कोणाला पूर्वपुण्याईने, कोणाला सद्गुरूच्या अनुग्रहाने, कोणाला मंत्रतंत्र, ध्यान धारणा वगैरेंमुळे ही सिध्दी प्राप्त होते, कोणाच्या अंगात ही दैवी शक्ती असते तर कोणाकडे पैशाचिक, अशा अनेक शब्दात आपण त्याचा उल्लेख ऐकतो. या सगळ्या प्रकारांचा समावेश मी 'अंतर्ज्ञान' या शब्दात करीत आहे.

माझ्या लहानपणी अशा अद्भुत शक्तीबद्दलच्या असंख्य कथा मी ऐकल्या आहेत. पण ती शक्ती धारण करणारे सिध्दपुरुष कधीकाळी होऊन गेलेले असत किंवा जीवंत असलेच तर त्यांची भेट घडणे माझ्या आंवाक्याबाहेरचे असे. त्यामुळे मला स्वतःला कसलाही चमत्कार पहायला मिळाला नाही. माझ्या आजूबाजूला असणा-या ज्या व्यक्तींच्या 'अंगात' येत असे त्यांची वागणूक पाहता मला कधीच त्यांचा विश्वास वाटला नाही. अशिक्षित लोकांचा त्यांवर जास्त विश्वास असल्यामुळे शिक्षणाच्या प्रसाराबरोबर चमत्कारांचे प्रमाण कमी होईल अशी माझी समजूत होती. आज मात्र मला एक वेगळेच चित्र दिसत आहे.

एनर्जी (ऊर्जा) आणि व्हायब्रेशन्स ( कंपन) या पदार्थविज्ञानात विशिष्ट अर्थ असलेल्या शब्दांचा उपयोग करून त्यातून निर्माण होत असलेल्या अचाट अशा सामर्थ्याबद्दल आजच्या सुशिक्षित लोकांना बोलतांना मी सर्रास ऐकतो. एनर्जी ही वेगवेगळ्या स्वरूपात असते आणि त्यानुसार योग्य त्या परिमाणात ती मोजली जाते. तिच्या वहनाबद्दल निश्चित असे नियम असतात. तसेच तिच्यामुळे होणारे परिणाम माहीत आहेत, व्हायब्रेशन्सना एक कंपनसंख्या असते आणि अँप्लिट्यूड असतो, त्यापासून निर्माण झालेल्या लहरींना या दोन्हीशिवाय वेव्हफॉर्म असतो एवढे मी कॉलेजमध्ये असतांना फिजिक्समध्ये शिकलो होतो. आता आत्मिक, प्राणिक, कॉस्मिक, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यासारख्या त-हेत-हेच्या एनर्जी तसेच कल्याणकारी, दुःखदायक, मैत्रीपूर्ण, वितुष्ट वाढवणारे, निर्मळ, कलुषित किंवा दूषित वगैरे प्रकारची व्हायब्रेशन्स आणि त्यांचे मानवाच्या व्यवसायातल्या नफ्यातोट्यावर, सुखशातीवर, आरोग्यावर, आयुष्यमानावर होणारे बरेवाईट परिणाम वगैरेंची वर्णने ऐकून मी थक्क होतो.

या ऊर्जा आणि ही कंपने कशाकशातून निर्माण होतील याचा तर कांहीच नेम नाही. दारावर टांगलेले तोरण, घराची खिडकी, त्यात बसवलेली लोखंडाची जाळी, भिंतीवरची तसबीर, टेबलावरले धातूचे कासव, गळ्यातला रुद्राक्ष किंवा ताईत, मनगटावर बांधलेला दोरा किंवा कडे, कुपणावरची जास्वंदी किंवा बोगनवेल, जन्मपत्रिकेतले ग्रह, तोंडाने किंना मनातल्या मनात एकादा श्लोक म्हणणे वगैरेमधून ती येतातच शिवाय टाळी किंवा चुटकी वाजवणे, डोळ्यांना ओली बोटे लावणे, हात जोडणे, मांडी घालून बसणे वगैरे क्रियांमधून होणा-या नाना प्रकारच्या व्हायब्रेशन्समधून ही एनर्जी वहात राहते असे सांगतात. कोणाच्या पायावर डोके ठेवले की त्याच्या पायातून ती आपल्या मस्तकात येते आणि आपल्या मस्तकावर त्याने हात ठेवला तर त्याच्या पंजातून आपल्या शरीरात त्याचा धोधो ओघ वहात येतो. या गोष्टी आदर व्यक्त करण्यासाठी करतात अशी माझी समजूत होती. त्यातून कंपने निर्माण होऊन ऊर्जेचा प्रवाह वाहता होतो असे कधी वाटले नव्हते. अशा प्रकारच्या तथाकथित विज्ञानाच्या गर्दीत आपल्या देशातले खरेखुरे सायन्स कुठेतरी हरवून जाईल की काय अशी आशंका मला वाटायला लागली आहे.

------

४.शास्त्र व विज्ञान यांतील फरक

Sunday, March 22, 2009

नियतकालिकांमध्ये येणार्‍या कांही लेखांमध्ये व माध्यमांद्वारे होणार्‍या चर्चेत 'शास्त्र' व 'विज्ञान' या शब्दांचा मुक्तपणे उपयोग केला जातो असे दिसते. त्यातील वैचारिक गोंधळ लक्षात घेऊन या दोन संकल्पनांवर माझे विचार मांडत आहे. हे दोन्ही शब्द प्राचीन काळापासून उपयोगात आलेले आहेत असे दिसते, पण संदर्भानुसार त्यांचे अर्थ बदलत आलेले आहेत. अनेक धार्मिक विधि आपण 'वेदशास्त्रपुराणोक्त' रीतीने करतो. त्यात 'शास्त्र' याचा अर्थ कांही नियम वा रीतीभाती असा होतो. न्याय, व्याकरण, संगीत, नाट्य अशा अनेक विषयांमधील परंपरागत नियमबध्दता शास्त्र या संकल्पनेत येते. "आपणा आपण जाणिजे तया नाम ज्ञान" असे म्हंटलेले आहे. गीतेमधील 'ज्ञान, विज्ञान' यांत स्वतःबद्दल किंवा आत्मापरमात्म्याची माहिती म्हणजे 'ज्ञान' आणि (बाह्य जगाची) विशिष्ट माहिती म्हणजे 'विज्ञान' असे ढोबळमानाने म्हणता येईल. 'सायन्स' ही संकल्पना पूर्वीच्या काळांत जगात कुठेही अस्तित्वात नव्हती. युरोपात देखील अगदी अलीकडेपर्यंत तो तत्वज्ञानाचा भाग होता. सतराव्या अठराव्या शतकात युरोपमध्ये सायन्सला वेगळे करण्यात आले व विसाव्या शतकात मराठीमध्ये 'विज्ञान' हा 'सायन्स' या शब्दाचा पर्याय झाला. परंतु 'शास्त्र' या शब्दाचा सुध्दा 'सायन्स'ला प्रतिशब्द म्हणून सर्रास उपयोग होतच राहिला.

व्याकरण शास्त्र, संगीत शास्त्र यासारख्या 'शास्त्रां'मध्ये माणसांनी केलेल्या अनेक नियमांचा समावेश होतो, ते नियम कालानुसार बदलत राहतात व वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असू शकतात. विज्ञान किंवा सायन्समध्ये फक्त निसर्गनिर्मित किंवा (आस्तिक लोकांच्या विश्वासानुसार) परमेश्वराने केलेले नियमच येतात, तसेच ते सर्वांना समान प्रकारे लागू होतात हा एक या दोन्ही संकल्पनांमध्ये महत्वाचा फरक आहे. माणूस विज्ञानाचे नियम फक्त समजून घेऊ शकतो, तो त्यात स्वतःचे नियम करू शकत नाही किंवा निसर्गाचे नियम बदलू शकत नाही. विज्ञानाचे नियम स्थळकाळातीत असतात. कोणीही ते सप्रयोग सिद्ध करू शकतो. सायंटिस्ट्स किंवा वैज्ञानिकांची इतर शास्त्रीपंडितांबरोबर तुलना होऊ शकत नाही, कारण निसर्गाच्या व्यवहाराचा सखोल अभ्यास करून त्यांत वैज्ञानिकांना जे सत्य दिसेल, जाणवेल, जे आकलन होईल तेवढेच ते इतरांना सांगतात तर इतर शास्त्री पंडित आपली स्वतःची मते, कल्पना, विचार वगैरे मुक्तपणे मांडतात, त्यांच्या क्षेत्रांत ते स्वतःचे नवे नियम बनवू शकतात.

उदाहरणार्थ हिन्दू असो वा ख्रिश्चन असो दोघांनाही पदार्थविज्ञानाच्या नियमाप्रमाणे ऊष्णतेचे चटके बसतात किंवा त्यांनी उंचावरून उडी मारली तर ते दोघेही गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार खाली येतील. हे परमेश्वराने बनवलेले 'विज्ञान' आहे. पण देवळामध्ये जोडे काढून व डोक्यावर टोपी किंवा पागोटे घालून जाणे आणि चर्चमध्ये शिरतांना डोक्यावरील हॅट काढून पण पायांतले बूट न काढता आत जाणे ही माणसांनी सांगितलेली शास्त्रे आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार ती धर्मशास्त्रे वेगवेळ्या प्रकारे विकसित झालेली आहेत.

मराठी भाषेत 'शास्त्र' व 'विज्ञान' हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरून फार मोठा गोंधळ निर्माण करून ठेवला गेलेला आहे. सोवळे ओवळे, उपास तापास वगैरे अनेक परंपरागत गोष्टी हिंदू धर्म'शास्त्रात' व्यवस्थित बसतात. मनातून एखादी गोष्ट करायची नसेल तेंव्हा सुध्दा इतरांसाठी आपण 'शास्त्रा'पुरती ती थोडीशी करतो. इथे 'शास्त्रा'चा 'विज्ञाना'शी कसलाही संबंध येत नाही. 'विज्ञान' या विषयामध्ये तर्कशुद्ध विचार करणे अत्यंत महत्वाचे असते. ध्वनीस्पंदने, विद्युल्लहरी अशा विज्ञानातल्या संकल्पना भोंगळपणे वापरण्याला तेथे वाव नाही. त्या वापरतांना त्यांच्या ऊर्जेचे मोजमाप, कंपनसंख्या, शरीरातील विशिष्ट भागांवर त्याचा प्रत्यक्ष होणारा निश्चित परिणाम, त्या परिणामाचे मोजमाप वगैरे समजून घेणे आवश्यक असते. "दरवाजावर आंब्याच्या पानांचे तोरण बांधले तर 'पॉझिटिव्ह एनर्जी'चा घरात संचार होतो" असले 'शास्त्र' 'विज्ञाना'त बसत नाही. कुठल्या तत्वाचा कोणी शोध लावला याहीपेक्षा तो कसा सिद्ध केला गेला हे 'विज्ञाना'त महत्वाचे असते. आधीच एक निष्कर्ष गृहीत धरून तो सिध्द करण्यासाठी त्याअनुषंगाने मुद्दे मांडणे हे 'नीतिशास्त्र', 'पाकशास्त्र', 'विधिसंस्था' वगैरेमध्ये ग्राह्य असेल पण ते 'विज्ञाना'ला धरून नाही. तिथे आधी एखादा सिध्द झालेला सिध्दांत मांडून किंवा प्रयोग करून त्यानुसार त्यातील निरीक्षणांचा सखोल अभ्यास करून त्यावरून निष्कर्ष काढावा लागतो.

समाजामध्ये या विषयावर होत असलेल्या चर्चेत या दोन्हीत गल्लत होतांना दिसते. "हवा डोळ्याला दिसत नाही पण अस्तित्वांत असते, तसाच देवसुध्दा अदृष्य असतो." असे म्हणणे किंवा "प्राध्यापकाचा मेंदू डोळ्याला दिसत नाही म्हणजे तो अस्तित्वातच नाही." असा युक्तिवाद करणे कथाकीर्तनासारख्या 'शास्त्रां'त कदाचित बसेल पण 'विज्ञाना'त निश्चितपणे नाही. डोळ्याला न दिसणार्‍या हवेच्या वा किंवा प्राध्यापकाच्या मस्तकातल्या मेंदूच्या अस्तित्वाची दुसरी एखादी खूण पटत असते म्हणून त्या अस्तित्वात असतात, त्या प्रमाणेच देवाची खूण ज्याला पटत असेल तर त्याने "तो आहे" म्हणावे, नसेल त्याने "तो आहे" असे वाटल्यास म्हणू नये, पण "तो नाही" असे म्हणण्याची सक्ती नाही. विज्ञानाच्या प्रथेप्रमाणे प्रत्यक्ष पुरावा असेल ते सिध्द होईल पण पुरावा नसेल तर सिध्द होणारच नाही असे नाही. कदाचित उद्या तो पुरावा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण तोपर्यंत थांबायला हवे. "बाप दाखव, नाही तर श्राध्द कर" असे 'शास्त्र' कदाचित सांगेल, 'विज्ञान' कधी असे सांगत नाही, पण बाप दिसला तर मात्र ते मुलाला त्याचे श्राध्द करू देणार नाही.

---

५.विज्ञाननिष्ठा आणि निरीश्वरवाद

Tuesday, November 22, 2011

विज्ञानाच्या मार्गावर चालणा-या लोकांनी निरीश्वरवादी असावे अशी काही लोकांची अपेक्षा असते. त्यांनी (विज्ञाननिष्ठांनी) देवाला नमस्कार करणे ही विज्ञानाशी प्रतारणा आहे असा सूर या (टीकाकार) लोकांच्या बोलण्यातून किंवा लिहिण्यातून निघतो. उलटपक्षी सर्वज्ञानी, सर्वसाक्षी, विश्वाचा कर्ताधर्ताहर्ता अशा ईश्वराचे अस्तित्व निर्विवाद आहे अशी गाढ श्रध्दा अधिक लोक बाळगतात. त्यांच्यातील काही जण अधून मधून उगाच विज्ञानाच्या नावाने खडे फोडत असतात. "देवदानवा नरे निर्मिले हे मत लोकां कवळू द्या।" अशी तुतारी फुंकणारे केशवसुत किंवा "धर्म ही अफूची गोळी आहे." असे सांगून देवासकट धर्माचे उच्चाटन करायला निघालेला माओझेदोंग (माओत्सेतुंग) यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात काम केले असल्याचे ऐकिवात नाही. नास्तिक विचारसरणी बाळगणारे लोक इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, भाषा अशा इतर विषयांचे विद्यार्थी किंवा निरक्षरसुध्दा असू शकतात. अमेझॉनच्या अरण्यामध्ये झाडावर झोपणारे किंवा उत्तर ध्रुवावरील बर्फात इग्लू बांधून राहणारे काही लोक अद्याप शिल्लक असतील तर ते नास्तिक असण्याचीच शक्यता मला जास्त वाटते.

विज्ञानाचा आणि परमेश्वरावरील अविश्वासाचा थेट संबंध दिसत नाही. पण विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या प्रसारामुळे लोकांच्या सामान्यज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या. अज्ञानाचा अंधार काही प्रमाणात नाहीसा झाल्यामुळे अज्ञाताची भीती कमी झाली, लोकांचा आत्मविश्वास वाढला. देवाच्या नावावर आणि त्याच्या कोपाच्या धाकामुळे चालत आलेल्या अनिष्ट प्रथांचे पालन न करण्याचे धारिष्ट्य ते दाखवू लागले. "हे लोक मुजोर झाले आहेत, देवालासुध्दा ते जुमानत नाहीत" अशा त्यावरील प्रतिक्रिया परंपराग्रस्त मंडळींकडून आल्या. यामुळे विज्ञानाचा ईश्वराला विरोध आहे असा समज प्रचलित झाला आणि तो टिकून आहे. माझ्या लहानशा जगात आलेला त्यासंबंधीचा माझा अनुभव आणि माझे निरीक्षण यांच्या आधारे या समजाबद्दल मी या लेखात लिहिणार आहे. देवधर्म, श्रध्दा, अंधश्रध्दा वगैरेंवर पूर्वीही अनेक वेळा चर्चा होऊन गेल्या आहेत. दोन्ही पक्ष आपापल्या मुद्यांवर ठाम असल्यामुळे त्यात स्टेलमेट होते. दुसरा कसा चूक आहे हे दाखवण्याच्या नादात कधीकधी याचे पर्यवसान परस्परावर आरोप-प्रत्यारोप, एकमेकांच्या लिखाणाचा विपर्यास, एकमेकांना शब्दात पकडणे वगैरेमध्ये होऊ लागल्यावर ते (आणि वाचक) त्याला कंटाळतात. या सगळ्याची पुनरावृत्ती करणे हे या लेखाचे प्रयोजन नाही. वैचारिक, तात्विक किंवा सैध्दांतिक पातळीवरून खाली येऊन जमीनीवरील प्रत्यक्ष परिस्थिती (ग्राउंड रिअॅलिटी) काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न मी या लेखात करणार आहे.

अणुशक्ती विभागातील वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि त्यांना सहाय्य करणारे इतर कर्मचारी यांच्या वसाहतीचे नाव 'अणुशक्तीनगर' असे आहे. या वसाहतीत वास्तव्याला राहिलेल्या लोकांमधून काही जण या क्षेत्रामधील सर्वोच्च पातळीपर्यंत पोचलेले आहेत. अनेक लोकांना त्यांच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे. अशा बुध्दीमान लोकाच्या सहवासात तीन दशके राहण्याची संधी मला मिळाली, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उच्च दर्जाचे काम करणा-या अनेक विद्वानांबरोबर व्यक्तीगत परिचय झाला, अनेक विषयांवर त्यांच्याशी संवाद साधता आला, त्यांच्या सहवासात दीर्घकाल राहिल्यामुळे त्यांच्या विचारांचा पगडा माझ्या मनावर उमटला असणे साहजीक आहे. त्या सर्वांमध्ये पूर्ण मतैक्य होते अशातला भाग नाही. पण सर्वांच्या मतांचा ढोबळ विचार करता त्यातून मला जे जाणवले आणि समजले ते लिहिण्याचा हा प्रयत्न आहे.

आपण 'निधर्मी' आहोत असे त्यांच्यापैकी कोणीही अधिकृतरीत्या कागदोपत्री नमूद केले असल्याचे मी तरी ऐकले नाही. माझ्या माहितीमधील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या धर्माची होती. त्याचा वृथा अभिमान ते एरवी मिरवत नसले तरी त्याचे एकादे तरी चिन्ह त्यांच्या घरात किंवा वागण्यात दिसत असे. गणेशोत्सव, दुर्गापूजा, कृष्णजन्माष्टमी, अय्यप्पापूजा यासारखे उत्सव सार्वजनिकरीत्या आणि दिवाळी, पोंगल, ओणम, लोहडी वगैरे सण वैयक्तिक पण मोठ्या प्रमाणावर इथे साजरे केले जात. अर्थातच त्या निमित्याने विवक्षित देवतांच्या प्रतिमांचे पूजन आणि त्यांची आराधना होतच असे. मूर्तीपूजा न मानणारे इतरधर्मीय त्यांच्या सणांच्या काळात त्यांच्या परंपरागत पध्दतीने त्यांच्या ईश्वराची प्रार्थना करीत. त्यासाठी त्यांनी आपापली वेगळी प्रार्थनास्थळे बांधली होती आणि तिथे विशिष्ट दिवशी ते मोठ्या संख्येने जमत असत. बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या परिसरात मी अनेक वेळा गेलो आहे. त्या ठिकाणी देखील मला असेच दृष्य दिसले. एका वर्षी मी ख्रिसमसच्या काळात इंग्लंडमध्ये आणि एकदा अमेरिकेत होतो. दोन्ही वेळी मी कुतूहलापोटी स्थानिक चर्चला भेट दिली होती. त्या वेळी तिथे अलोट गर्दी होत होती. वैज्ञानिक, तंत्रज्ञ, डॉक्टर वगैरे मंडळी या उत्सवात सहभाग घेत नसल्याचे मी कुठेच ऐकले नाही. विज्ञानाकडे वळल्यामुळे जर माणसे सरसकट नास्तिक होत असली तर त्यांच्या वसाहती हे अंधश्रध्दा निर्मूलन संघटनांचे भक्कम किल्ले (गढ) व्हायला पाहिजे होते, पण आमच्या वसाहतीत मला त्यांचे अस्तित्व फारसे जाणवले नाही.

कार्यालये, कार्यशाळा आणि प्रयोगशाळांमध्ये काम करतांना हीच वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ मंडळी त्यात मग्न होऊन जात असत. काही लोकांना आपला प्रपंचच नव्हे तर तहानभूकसुध्दा विसरून तास न् तास संशोधनकार्यात गढून गेलेले मी अनेक वेळा पाहिले आहे. त्यातील आव्हाने पेलण्यासाठी आणि अडचणींचे डोंगर पार करण्यासाठी ते स्वतःच कसून मेहनत करीत, त्यासाठी कोणी देवाचा धावा केलेला मला दिसला नाही. संशोधन किंवा निर्मितीमधील प्रत्येक काम त्या ठिकाणी वैज्ञानिक आणि शास्त्रशुध्द पध्दतीने केले जात असे. विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयी त्यांच्या ठायी असलेल्या निष्ठेबद्दल शंका घेता येणार नाही. परिसंवाद, चर्चासत्रे वगैरेंमध्ये विषयाला धरून विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील सिध्दांतांच्या आधारेच वाद, विवाद, संवाद वगैरे होत असत. देवाचे असणे किंवा नसणे यापैकी कशाचाच उल्लेख त्यात येत नसे. त्या ठिकाणी ही बाब पूर्णपणे अप्रस्तुत असे.

वसाहतीमध्ये होणारे उत्सव आणि समारंभ यात भाग घेतांना मात्र देवाचा उल्लेख करतांना कोणाला संकोच वाटत नसे किंवा त्यात आपले काही चुकते आहे अशी अपराधीपणाची भावनाही वाटत नसे. अर्थातच 'विज्ञान' आणि 'ईश्वर' या एकमेकांच्या विरोधी 'म्यूच्युअली एक्स्क्ल्यूझिव्ह' संकल्पना आहेत असे मानले जात नसे. अणुशक्ती आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष असलेले एक ज्येष्ठ वैज्ञानिक आमच्या वसाहतीत खूप वर्षांपूर्वी झालेल्या एका समारंभात प्रमुख पाहुणे होते. त्यांनी केलेल्या भाषणाचा काही भाग मला अजून आठवतो. त्या वेळी त्यांनी असे सांगितले, "आमची कार्यालये, प्रयोगशाळा वगैरेंमध्ये काम करण्यासाठी काही नियम असतात, पोलिस अधिकारी वाहतुकीचे नियम करतात, तसेच नागरिकांसाठी सरकार कायदे कानून करते. यांचे पालन कशा प्रकारे केले जाते हे पाहण्यासाठी खास यंत्रणा उभ्या कराव्या लागतात, तरीसुध्दा त्यांचे उल्लंघन होण्याचे प्रकार घडतच असतात, हे नियम वेळोवेळी बदलले जातात किंवा ते बदलावे लागतात. पण विज्ञानातले नियम मात्र कधीही कोणीही तोडू किंवा बदलू शकत नाही. अमेरिकेला किंवा चीनला जाल तर तिथले काही कायदे वेगळे दिसतील, पण विज्ञानविषयामधील नियम तेच्या तेच असतात. विज्ञानामधील कोणत्याही समीकरणातला 'कांन्स्टंट' हा काँन्स्टंटच राहतो. अशा ज्या अगणित नियमांच्या आधारावर या विश्वाचे व्यवहार अचूकपणे आणि अव्याहतपणे चालत राहिलेले आहेत त्यामधील सातत्य कशामुळे किंवा कोणामुळे आले? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात परमेश्वर या संकल्पनेचा आधार मिळतो. वगैरे वगैरे ..." थोडक्यात म्हणजे अगम्य आणि अतर्क्य अशा गोष्टींची जबाबदारी अखेरीस देवावर सोपवणे वैज्ञानिकांनाही भाग पडते किंवा सोयिस्कर वाटते.

माझ्या कामापुरता विचार करतांना असे जाणवते की कित्येक बुध्दीमान आणि तज्ज्ञ लोकांचे ज्ञान, विचार, कल्पना, अनुभव आणि कौशल्य यांचा उपयोग करून आणि अनेक प्रकारची किचकट आकडेमोड व विश्लेषणे करून आम्ही नवनवी स्वयंचालित यंत्रसामुग्री बनवून घेत असू. पण आम्ही कागदावर ओढलेल्या रेघोट्यांवरून त्याचे सर्व भाग कारखान्यांमध्ये तयार झाले, ते एकमेकांशी नीटपणे जुळले, त्यातून तयार झालेले नवे यंत्र पहिल्याच प्रयत्नात सुरू झाले आणि अपेक्षेप्रमाणे सुरळीतपणे काम करायला लागले असे कधीच झाले नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या इतर क्षेत्रात काम करणा-या लोकांचा अनुभवसुध्दा असाच असतो असे त्यांच्याकडून कळत असे. यामागील कारणे किंवा त्यावरील उपाययोजना हा या लेखाचा विषय नाही. याच्या उलट एका लहानशा मुंगीच्या शरीरातील श्वसन, पचन, रक्ताभिसरण वगैरे गुंतागुंतीच्या संस्था, तिच्या ठायी असलेली दृष्टी व घ्राणेंद्रियांसारखी ज्ञानेंद्रिये, पाय व तोंडासारखी कर्मेंद्रिये आणि या सर्वांवर नियंत्रण ठेवणारा, आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती बाळगणारा निर्णयक्षम असा मेंदू हे सगळे किती सूक्ष्म असतात, त्यांची रचना कशा प्रकारची असते आणि त्यांचे कार्य कसे चालते यावर खूप संशोधन केले गेले आहे. पण अजूनपर्यंत ते पूर्णपणे समजलेले असावे असे मला वाटत नाही. हे सगळे आपल्या आपण होत असते असे मान्य करणे जड जातेच. विचारपूर्वक आणि योजनापूर्वक रीतीने करूनसुध्दा आपली तुलनेने सोपी असलेली कामे पूर्णपणे मनासारखी होत नाहीत आणि असंख्य प्राणीमात्रांच्या शरीरातल्या इतक्या गुंतागुंतीच्या क्रिया आपोआप कशा चालत रहातात याचे आश्चर्य वाटते.

आपल्या शरीरातील बाह्य आणि अंतर्गत अवयवांच्या रचना आणि कार्यप्रणाली थक्क करतातच, त्या शिवाय त्यात किती प्रकारच्या ग्रंथी असतात आणि त्या ठराविक वेळी ठरलेली निरनिराळी द्रव्ये योग्य त्याच प्रमाणात निर्माण करून त्यांचा पुरवठा आपल्या शरीराला करत असतात यांचा अंत लागत नाही. आपण खाल्लेल्या अन्नाचा एकत्रित रस रक्तामधून शरीरभर फिरत असतो. त्यातला काही भाग त्या ग्रंथींपर्यंत जाऊन पोचतो आणि त्यातील नेमकी द्रव्ये शोषून घेऊन या ग्रंथी विशिष्ट प्रकारचे रस तयार करून ते विशिष्ट अवयवांकडे पाठवतात आणि ते रस योग्य त्या जागेपर्यंत जाऊन पोचतात. या गोष्टी कशा घडतात हे आपल्या आकलनाच्या पलीकडेच नव्हे तर कल्पनेच्या पलीकडे असल्याचे जाणवते. आपल्याच शरीरात हे काम अविरतपणे बिनबोभाट चाललेले असते, पण आपल्याला त्याची जाणीवसुध्दा नसते आणि काही कारणाने त्यात खंड पडला तरच त्याचे परिणाम आपल्याला समजतात. कदाचित यामधील गुंतागुंत, विविधता आणि अनिश्चितता यामुळेच काही डॉक्टर मंडळी "मी इलाज करतो, 'तो' बरे करतो (आय ट्रीट, 'ही' क्युअर्स)" असे सांगणारे फलक दवाखान्यात लावत असावेत. प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ आणि शल्यक्रियाविशारद स्व.डॉ.नितू मांडके यांची टीव्हीवरील एक मुलाखत मला चांगली आठवते. त्यात त्यांनी सांगितले होते, "कोणत्या क्षणी कोणत्या व्यक्तीला कोणता आजार होईल, त्या वेळी त्याला कोणता डॉक्टर भेटेल, त्याने दिलेल्या औषधोपचाराला त्या रुग्णाचे शरीर कसा प्रतिसाद देईल या सगळ्याबद्दल काहीही निश्चितपणे सांगता येत नाही." आभाळाकडे बोट दाखवत ते म्हणाले होते, "हे सगळे 'तो' ठरवतो." त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या बाबतीतच धक्कादायक असे काही अघटित घडणार आहे याची पुसटशी कल्पनाही त्या वेळी कोणाच्या मनाच आली नसेल.

गेल्या आठवड्यात मला आलेल्या एका लहानशा अनुभवाचे कथन मी एका लेखात केले होते. ध्यानीमनी नसतांना अचानक एकादे संकट ओढवावे किंवा खूप मोठ्या संकटाची चाहूल लागावी आणि त्यातून सुटका व्हावी असे अनेक अनुभव बहुतेक लोकांच्या आयुष्यात घडत असतात. एकादा अपघात होऊन गेल्यानंतर त्यातून (योगायोगाने की सुदैवाने की ईश्वरी कृपेने?) बचावलेल्या लोकांच्या (मिरॅक्युलर एस्केपच्या) अनेक गोष्टी बाहेर येतात. प्रत्यक्ष अॅक्सिडेंट्सच्या तुलनेत थोडक्यात वाचण्याची ('नियर मिस'ची) संख्या मोठी असते असा निदान माझा अनुभव आहे. त्यामुळे कोणी अदृष्यपणे हे घडवून आणत असावे की काय? असा विचार मनात येणे स्वाभाविक असते. हा निव्वळ योगायोगाचा भाग असणार हे बुध्दीला पटले तरी त्याने मनाचे पूर्ण समाधान होत नाही. शिवाय आपला कोणी अज्ञात आणि अदृष्य पाठीराखा (किंवा कर्ता करविता) आहे ही सुखद कल्पना मनाला धीर देते, मनाचा समतोल सांभाळायला मदत करते. मनामधील घालमेलींचा शरीरावर परिणाम होतो असे डॉक्टरही सांगतात. त्यामुळे याचा प्रत्यक्ष लाभ होऊ शकतो. हे सारे खूप किचकट आहे आणि प्रत्येकाच्या बाबतीतले धागेदोरे आणि त्यांची गुंतागुंत निराळी असते. पण बहुतेक वेळा शेवटी त्याचा परिणाम देवावरील विश्वासाकडे झुकण्यात होतो. 'त्या'चे कार्यक्षेत्र 'संकटमोचन' एवढेच न राहता विश्वाचा सारा पसारा सांभाळण्यापर्यंत विस्तारते. तसेच अनपेक्षित असे विपरीत काही घडले आणि त्याची कारणे समजली नाहीत तर त्याची जबाबदारी 'त्या'च्यावर टाकणे हे त्या विषयावर जास्त विचार करण्यापेक्षा कमी कष्टप्रद असते. घरातील आणि समाजातील वातावरणामुळे ही गोष्ट अंतर्मनात ठसलेली असते हे बहुधा त्याचे मुख्य कारण असावे.

मला आश्चर्यकारक वाटणारी आणखी एक गोष्ट आहे. स्वार्थ हा सर्व प्राणीमात्रांचा मूळ स्वभाव असावा असे मला तरी दिसते. मुंग्या, झुरळे, उंदीर, चिमण्या वगैरे जीव बेधडक आपल्या घरात शिरतात आणि त्यांना मिळेल त्यातले हवे असेल ते भक्षण करतात किंवा घेऊन जातात. जंगलामधील हिंस्र पशू मिळेल त्या अन्य पशूंची शिकार करून त्यांना खातात, तसेच शाकाहारी पशू त्यांना सापडलेल्या वनस्पतींच्या पानाफुलाफळांना खाऊन फस्त करतात. "हे आपले नाही, परक्याचे आहे" असा विचार ते करत नसणार. मनुष्यप्राण्याची मूळ वृत्ती याहून निराळी असण्याचे शास्त्रीय कारण मला दिसत नाही. तरीसुध्दा दुस-यांचा विचार, परोपकार, त्याग, बलिदान वगैरे करावे असे माणसांना का वाटते? तात्कालिक विचार करता माणसामधील चांगुलकीचा त्याला प्रत्यक्ष लाभ होण्यापेक्षा थोडीशी हानी होण्याची अधिक शक्यता दिसत असते, दुस-याला मदत करणे याचा अर्थ आपल्या मालकीचे काही तरी त्याला देणे किंवा त्याच्या भल्यासाठी स्वतःला कष्ट देणे असा होतो, तरीसुध्दा माणसे इतरांच्या मदतीला का धावतात? काही दुष्ट आणि लबाड लोक यशस्वी होऊन मजेत राहतात आणि त्यांच्या तुलनेत प्रामाणिक सरळमार्गी लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो असे दिसत असतांना माणसे चांगली का वागतात? या प्रश्नांचे तर्कशुध्द उत्तर मला मिळत नाही, त्यामुळे अशा सत्प्रेरणा त्यांच्या मनात उत्पन्न करणारी एकादी अगम्य अशी (ईश्वरी) शक्ती त्यामागे असावी असे कोणी सांगितले तर ते थोडेसे पटते. या सत्प्रेरणा दुष्टांच्या मनात का निर्माण होत नाहीत या प्रश्नाचे उत्तर मात्र माझ्याकडे नाही.

शेवटी देवालाच शरण जाणार असलात तर तुमच्या विज्ञानाच्या अभ्यासाचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होणे साहजीक आहे. हा प्रश्न स्वतःलासुध्दा पडतो आणि त्याचे उत्तर सुचते. ते सर्वांना मान्य होईल अशी माझी अपेक्षा नाही. विज्ञानाच्या अभ्यासातून मला जेवढे समजले त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कोणताही मानव शून्यामधून धुळीचा एक कणसुध्दा तयार करू शकत नाही किंवा त्याला नष्ट करू शकत नाही (काँझर्वेशन ऑफ मॅटर). त्यामुळे असे चमत्कार करून दाखवणा-या बाबांच्या हातचलाखीवर मी विश्वास ठेवत नाही. सूर्य, चंद्र, शनी, मंगळ वगैरे आकाशात फिरत राहणा-या (निर्जीव) गोलांची शास्त्रीय माहिती उपलब्ध झालेली असल्यामुळे राग, लोभ, प्रेम, द्वेष, दया, इच्छा, अपेक्षा यासारख्या मानवी भावना त्यांना असण्याची कणभर शक्यता मला दिसत नाही आणि माणसांच्या वैयक्तिक जीवनात ते उगाच लुडबूड करत नाहीत याची मला खात्री आहे. 'पॉझिटिव्ह' किंवा 'निगेटिव्ह व्हायब्रेशन्स', 'आत्मिक' किंवा 'प्राणिक' प्रकारची 'कॉस्मिक एनर्जी' असल्या भंपक शब्दांनी मी फसत नाही. मला आजारपण आले तर मी त्याच्या निवारणासाठी डॉक्टरकडेच जातो. 'सिध्दीं'द्वारे तो 'छूमंतर' करणा-यांकडे जात नाही. पुराणातील 'सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथां'ना मी त्यापेक्षा वेगळे समजत नाही. देवाने मला ढीगभर दिले तरच त्यातले चिमूटभर मी त्याला (म्हणजे त्याचे प्रतिनिधित्व करणा-याला) परत देईन असली सौदेबाजी मी करत नाही. उपाशी राहून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने मी स्वतःला कष्ट करून घेण्यामुळे देवाला आनंद होत असेल आणि तो माझ्यावर अधिक कृपावंत होईल असे मला वाटत नाही. विज्ञानाच्या अभ्यासामुळे मिळालेल्या चिकित्सक वृत्तीची आणि त्यानुसार करत असलेल्या आचरणाची अशी असंख्य उदाहरणे देता येतील.

पण कधी कधी अनाकलनीय, विलक्षण असे अनुभव येतात आणि त्यांचे समर्पक स्पष्टीकरण मिळत नाही. शरीरात त्राण नसते, मनामध्ये अगतिकता आलेली असते, विचारशक्ती बधिर झालेली असते, स्मरणशक्ती क्षीण झालेली असते, अशा वेळी देवाची आठवण कशी होते हे सुध्दा पहायला गेल्यास एक गूढ आहे. पण हा अनुभव नाकारता येत नाही. तसेच त्यातून मनाला दिलासा मिळत असला तर तो नाकारण्याचा हट्ट तरी कशाला? बालपणापासून अंतर्मनात नकळत साठवला गेलेला आस्तिकतेचा विचार त्या वेळी समोर येतो आणि मनाला पटतो. हा सोपा मार्ग असेलही, पण तो सोयीचा असेल आणि दुस-या कोणाला त्याचा उपसर्ग होत नसेल तर तो चोखाळायला काय हरकत आहे? आजूबाजूच्या बहुतेक लोकांच्या बाबतीत असेच होत असावे. अखेर विज्ञानाची उपासना हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे, संपूर्ण जीवन नव्हे, हे सत्य आहे. जीवनाच्या सर्व पैलूंनी एकमेकांशी सुसंगत असायलाच पाहिजे असे प्रत्यक्षात झालेले दिसत नाही, त्यामुळे असा आग्रह धरण्यात अर्थ नाही. त्यातले विविध रंग हेच कदाचित त्याचे वैशिष्ट्य असेल ! कुंपणावर बसणे किंवा दोन्ही दगडावर हात ठेवणे असे त्यातून वाटले तरी आजूबाजूला सगळे तेच करतांना दिसतात.

थोडक्यात सांगायचे तर विज्ञानावरील निष्ठा आणि आस्तिकपणा यामधील फक्त एकाचीच निवड करण्याची गरज नाही. बुध्दीच्या आवाक्यापर्यंत विज्ञानावर निष्ठा आणि त्याच्या पलीकडे अंतर्मनात वसलेला परमेश्वरावरील विश्वास असे दुहेरी धोरण अवलंबणारे मोठ्या संख्येने दिसतात. विज्ञानाच्या क्षेत्रामधील संशोधनातून जगापुढे मांडले गेलेले निसर्गाचे नियम हे त्या जगन्नियंत्या परमेश्वराने बनवले आहेत असा विचार केल्यास त्याबद्दल असलेली निष्ठा हा देवावरील श्रध्देचा एक भाग (सबसेट) होतो असेही म्हणता येईल आणि त्यात विसंगती वाटणार नाही. या उलट पाहता परमेश्वराचे अस्तित्व प्रयोगातून सिध्द करता येत नाही आणि त्याबद्दल केलेली विधाने पुरेशी तर्कशुध्द वाटत नाहीत म्हणून ते नाकारणे विज्ञानावरील निष्ठेशी सुसंगत आहे असे म्हणता येईल. मन आणि बुध्दी यांचे कार्य नेमके कसे चालते हे जेंव्हा (आणि जर) विज्ञानाद्वारे स्पष्टपणे कळेल तेंव्हाच याचा अधिक उलगडा होईल.

-----------


६, विदा, माहिती, ज्ञान आणि शहाणपणा

Wednesday, March 30, 2016

एकादा किंवा अनेक चांगले गुरू शोधून त्यांचेकडून विद्या, कला कौशल्य, ज्ञान आदि संपादन करणे हा सर्वश्रुत राजमार्ग तर आहेच, याशिवाय आणखी चार महत्वाचे मार्ग खालील सुभाषितात सांगितले आहेत.

केल्याने देशाटन, पंडितमैत्री, सभेत संचार ।

शास्त्रग्रंथविलोकन मनुजा चातुर्य येतसे फार ।।

दूरवरचा प्रवास करतांना निसर्गाची अनेक रूपे दिसतात, वाटेत निरनिराळी माणसे भेटतात आणि नाना प्रकारचे अनुभव येतात. त्यातून माणूस शहाणा होत जातो. विद्वान लोकांशी मैत्री करून त्यांच्या सान्निध्यात राहिल्यास त्यांच्या बोलण्यामधून ज्ञानामृताचे कण कानावर पडतात, त्यांच्याकडून आपल्या मनातल्या शंकांचे निरसन करून घेता येते. सार्वजनिक किंवा विशिष्ट सभासंमेलनांमध्ये भाग घेतल्यास तिथे होत असलेली अनेक वक्त्यांची भाषणे, त्यांच्यामधले वाद, प्रतिवाद, संवाद वगैरेंमधून बरेच काही शिकायला मिळते आणि शास्त्रग्रंथांना तर गुरू असेच म्हणतात. ते ज्ञानाचे महासागर आहेत, त्यातून आपल्याला हवे ते ज्ञान आपल्या कुवतीप्रमाणे ओंजळी ओजळीने  घेता येते.

यातल्या कोणत्याही मार्गाने ज्ञान संपादन केल्यानंतर त्याचे काय करावे यावर समर्थ रामदासस्वामींनी असा सल्ला दिला आहे की ते मुक्तपणे वाटून टाकावे.

जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांशी सांगावे । शाहाणे करून सोडावे, सकलजन ।।

सुभाषितकार आणि रामदासस्वामी यांच्या काळात फक्त दुर्मिळ हस्तलिखित पोथ्या असायच्या आणि त्याही बहुतेककरून राजे रजवाडे किंवा शास्त्रीपंडित लोकांकडेच. सामान्य माणसांमधले बहुसंख्य लोक निरक्षर असत आणि अभंगवाणी, भारुडे, पोवाडे वगैरेंचा प्रसार तोंडीच होत असे. साक्षर लोकांमधली सुद्धा बरीचशी ज्ञानाची देवाण घेवाण मौखिक पद्धतीने होत असे. बाराखड्या आणि पाढे यांचेपासून ते श्लोक, आरत्या, मंत्रविधींपर्यंत सगळे शिक्षण घोकंपट्टीमधूनच होत असे आणि पुढील पिढीला दिले जात असे. यामुळे पूर्वीच्या काळात माहिती, ज्ञान आणि शहाणपणा (Information, Knowledge and wisdom) यातल्या फरकांचा फारसा कीस काढला जात नसावा. त्यांचा उपयोग साधारणपणे समान अर्थानेच होत असे. विदा (Data दिलेली किंवा गृहीत धरलेली माहिती) हा नवा शब्द तर अस्तित्वातच आला नव्हता. आजसुद्धा तो प्रचलित झालेला नाही.

यंत्रयुगामध्ये छापखाने सुरू झाल्यानंतर पुस्तके, नियतकालिके, पत्रके वगैरे अनेक मार्गांनी माहितीचा प्रसार होऊ लागला आणि साक्षरतेचे प्रमाण वाढत गेल्याने त्याचा विस्तारही वाढत गेला. मुद्रणकलेमध्ये जसजशी प्रगती होत गेली त्यानुसार हे माध्यम खूपच वेगाने वाढत व विस्तारत गेले. शास्त्रीय प्रयोग, तपासण्या, मोजमापे, पहाण्या, चाचपण्या वगैरेंमधून खूप मोठ्या प्रमाणावर आकडेवारी जमा व्हायला लागली. संगणकांच्या उपयोगाने हे काम अधिक सुलभ झाले आणि आंतर्जालामधून ते जगभर उपलब्ध व्हायला लागले. आजकाल माहितीचा एवढा मोठा महापूर यायला लागला आहे की आपण त्यात बुडून किंवा वाहून जाऊ की काय अशी भीती वाटायला लागली आहे.  त्यामुळे या विषयावर विचार परामर्ष होऊ लागला आहे.  ज्ञानाचे व्यवस्थापन (Knowledge Management) या नावाची एक वेगळी शाखासुद्धा निघाली आहे.

एक सोपे उदाहरण घ्यायचे झाले तर आजकाल ठिकठिकाणचे तपमानाची नोंदणी करण्याची व्यवस्था केली गेली आहे. दिवसातल्या कोणत्या वेळी कोणत्या गावात किती तपमान आहे हे त्या नोंदींवरून समजू शकते. शेकडो गावांमध्ये कोणत्या दिवसातल्या चोवीस तासांमध्ये वेळोवेळी किती तपमान होते याची वर्षभराची आकडेवारी गोळा केली तर त्याला विदा  (Data, दिलेली माहिती) म्हणतात. अशा नुसत्याच आकड्यांच्या ढिगाला संदर्भांशिवाय काहीच अर्थ नसतो. पण एकाद्या विशिष्ट गावी तिथले तपमान कसे कसे वाढत किंवा कमी होत गेले, दर रोज कमाल आणि किमान तपमान किती असायचे व किती वाजता असायचे, एकाच वेळी निरनिराळ्या ठिकाणच्या तपमानात किती फरक असायचा, वर्षभरामध्ये तो कसा आणि किती बदलत जायचा असे काही संदर्भ घेऊन त्यानुसार ती आकडेवारी मांडली तर मग ती माहिती (Information) झाली.

त्या माहितीचा अभ्यास करून त्यातून काही बोध घेतला, तपमानातले बदल आणि फरक यांची कारणमीमांसा करून ते समजून घेतले तर ते त्या विषयातले ज्ञान (Knowledge) झाले.  विषुववृत्ताजवळ वर्षभर साधारणपणे एकच आणि ऊष्ण तपमान असते तर ध्रुवप्रदेशांमध्ये कडाक्याची थंडी असते. समुद्रसपाटीपेक्षा खूप उंच हिमालयासारख्या पर्वतावर गेल्यास तिथेही थंडी असते आणि समुद्रकिना-यापासून दूर गेल्यास विषम तपमान असते. वगैरे, वगैरे. त्या ज्ञानाची इतर ज्ञानांशी सांगड घातली आणि त्यानुसार काही निर्णय घेतले किंवा उपाय योजना केली, उदाहरणार्थ थंडीच्या दिवसात किंवा शीत प्रदेशात जातांना लोकरीच्या कपड्यांची सोय केली, उन्हाळ्यात किंवा ऊष्ण कटिबंधात आपले घर कसे थंड राहील याचा विचार केला तर ते शहाणपण (wisdom) झाले.  यात अगदी कोणालाही समजेल असा साधा तर्क आहे.   ज्ञानाचे व्यवस्थापन ( Knowledge Management) या भरभक्कम नावाची धास्ती घेण्याचे काही कारण नाही.

वरील सोप्या उदाहरणातला पुढला जटिल भाग पाहिला आणि मागील दहा, वीस, पन्नास, शंभर वर्षांच्या जगभरातल्या माहितीचा आणखी सखोल विचार केला तर मग त्यातून जागतिक तापमानवाढीचे धोके (Global Warming) लक्षात येतात आणि त्याच्या मागील कारणे पाहता पर्यावरणाची होत असलेली हानी ही केवढी मोठी समस्या आहे हे समजते. पण हे ज्ञान मिळाले तरी आपण ती हानी करू नये हे शहाणपण काही सगळ्यांना सुचत नाही ते नाहीच. त्यात कोणाचे स्वार्थ आडवे येतात, तर कोणाचा आळशीपणा. काही लोकांना तर हे मुळात पटतच नाही. परमेश्वर आणि त्याचेच रूप असलेला निसर्ग आपल्यापेक्षा खूप अधिक बलवान आहे, त्याचे तो पाहून घेईल, क्षुद्र मानवाने त्याची कशाला काळजी करायची वगैरे युक्तीवाद केले जातात आणि ते बरोबरही वाटतात.

विदा, माहिती, ज्ञान आणि शहाणपणा (Data, Information, Knowledge and wisdom) हे क्रमशः एकामधून एक निर्माण होतात असे आपण वर पाहिले असले तरी त्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये माणसाचा सहभाग किंवा हस्तक्षेप असतोच. मुळात कोणत्या उद्देशाने कोणती आणि किती आकडेवारी जमा करायची, त्यासाठी कोणती पद्धत वापरायची वगैरे गोष्टी काही लोकच ठरवतात. त्या आकडेवारीतून कोणते निकष लावून कशा प्रकारच्या माहितीचे संकलन करायचे आणि प्रस्तुत करायचे हे माणसेच ठरवतात. या दोन्हींबद्दल अनेक वेळा शंका घेतल्या जातात, आरोप केले जातात. मिळवलेल्या माहितीचे चर्वण करून त्यामधून कोणते निष्कर्ष काढायचे यासाठी  उच्च दर्जाची बुद्धीमत्ता लागते, ती सर्वांकडे नसते. त्यामुळे त्या बाबतीत मतभेद होतात. तरीही हे सगळे ठरवून करता येते. पण शहाणपणा हा ब-याच अंशी उपजत येतो आणि अनुभवाने त्यात भर पडत जाते. तो शिकून मिळवता येईलच असे सांगता येणार नाही.  माणसाच्या बहुतेक सगळ्याच क्रियांमध्ये उपजत स्वभाव किंवा अंतःप्रेरणा (Instinct) यांचा प्रभाव दिसतो.  विदा, माहिती, ज्ञान आणि शहाणपणा यांच्या व्यवस्थापनात तो चढत्या क्रमाने वाढतांना दिसतो. या अंतःप्रेरणा कशा निर्माण होतात हे काही अजून तरी नीटसे समजलेले नाहीच.

अखेर शेवटी या बाबतीतही आपल्याला सगळे काही पूर्णपणे समजलेले नाही आणि अनेक मुद्दे दैवाधीन किंवा परमेश्वराची लीला यावर सोडून द्यावे लागतात असेच दिसते. 

----

७. ज्ञानी, शहाणे आणि पढतमूर्ख

Wednesday, April 20, 2016

उपलब्ध असलेल्या अमाप विदांमधून (Dataमधून) आपल्याला हवी ती उपयुक्त किंवा मनोरंजक माहिती (Information) वेचून घेतली जाते, ती समजून घेऊन आत्मसात करण्यामधून त्या बाबतीतले ज्ञान (Knowledge) प्राप्त होते आणि त्या ज्ञानासोबत माणसाचा शहाणपणा (Wisdom) वाढत जातो असे ढोबळपणे सांगितले जाते हे मी मागील लेखामध्ये उदाहरणासह दाखवले होते. तसेच इंस्टिंक्ट (Instinct) किंवा उपजत बुद्धीचा यात किती मोठा वाटा असतो हेसुद्धा दाखवले होते. या लेखात यावर आणखी थोडा विचार करू.

डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा या पांच ज्ञानेंद्रियांमधून आपल्याला ज्ञान मिळत जाते. पण म्हणजे नेमके काय होते ? बाहेरच्या जगामधून (समोरून) आलेले विविध रंगांचे प्रकाशकिरण डोळ्याच्या भिंगांमधून आत शिरतात आणि मागील बाजूला असलेल्या लहानशा पडद्यावर केंद्रीभूत (Focus)होऊन त्यामधून एक सलग अशी आकृती तयार होते. त्या पडद्याच्या कुठल्या सूक्ष्म बिंदूवर कोणत्या रंगाचे किती तीव्रता असलेले किरण येऊन पोचले यांच्या संवेदना असंख्य अतीसूक्ष्म अशा मज्जातंतूंमधून मेंदूकडे पोचवल्या जात असतात आणि तिथून त्या स्मरणामध्ये साठवून ठेवल्या जात असतात. हे सगळे एक दशांश सेकंदामध्ये घडते. आपला मेंदू कोणत्याही क्षणी मिळालेल्या संवेदना  पूर्वीच्या संवेदनांशी पडताळून पाहतो आणि त्या चित्राचा अर्थ लावतो.  घरातल्या वस्तू असोत, दूरवरची दृष्ये असोत किंवा निरनिराळी माणसे या सगळ्यांना आपण अशा प्रकारे पाहून ओळखतो. यात डोळ्यांपेक्षा मेंदूचा म्हणजे बुद्धी आणि स्मरणशक्ती यांचा जास्त सहभाग असतो. याच प्रमाणे कानावर येऊन आदळलेल्या ध्वनिलहरींमुळे कानातल्या पडद्यावर जी निरनिराळी कंपने उठतात ती मज्जातंतूंमधून मेंदूला पोचवली जातात आणि स्मरणात साठवली जातात. कोणताही नवा आवाज कानावर पडताच पूर्वी ऐकलेल्या ध्वनींच्या आणि ज्ञानाच्या सहाय्याने आपण तो नाद ओळखतो. याच प्रकारे नाकाने गंध आणि जिव्हेने रुची समजते, ती लक्षात राहते आणि तशीच संवेदना पुन्हा मिळाली की आपण तिला ओळखतो. त्वचा ही तर फारच अजब असते. तिला झालेल्या स्पर्शामधून एकादी वस्तू थंड आहे की गरम, मऊ आहे की कठीण, गुळगुळीत आहे की खडबडीत, कोरडी आहे की ओली किंवा तेलकट अशा अनेक प्रकारच्या नाना संवेदनांमधून आपल्याला स्पर्शांची माहिती मिळत असते. या सगळ्या माहितीमधून आपले ज्ञान वाढत असते. जन्माला आलेल्या बाळाच्या आठवणींची पाटी कोरी असते. हळूहळू जसजसे  त्याचे ज्ञान वाढत जाते त्याप्रमाणे ते मूल जवळच्या माणसांचे चेहरे, आवाज आणि स्पर्श ओळखायला लागते. या पंचेंद्रियांना इंग्लिश भाषेत 'सेन्स ऑर्गन्स' (Sense Organs) असे म्हणतात हे मला अधिक समर्पक वाटते. कारण ही इंद्रिये फक्त संवेदना (डेटा किंवा माहिती) मेंदूला पुरवतात, बुद्धीमुळे त्याचे रूपांतर ज्ञानात होत असते.

पंचेंद्रियांमधून मिळणारी माहिती किंवा तिच्यामधून होत असलेले ज्ञान सगळ्याच सजीवांकडे असते. काही पशूंची घ्राणेंद्रिये , कान किंवा दृष्टी माणसापेक्षाही जास्त संवेदनाशील असतात. तरीही सर्व प्राणीमात्रांमध्ये माणूसच जास्त हुशार किंवा शहाणा कां असतो ?   त्याची कुशाग्र बुद्धी हे मुख्य कारण आहेच.  तिचा उपयोग करून त्याने भाषा निर्माण केल्या.   ज्ञानेंद्रियांमधून मिळत असलेली माहिती क्षणिक असते. या क्षणाला जे दृष्य डोळ्यांना दिसले, जे नाद कानाला ऐकू आले त्यांचे संदेश तिथेच संपतात. पुढच्या क्षणाला वेगळे किरण डोळ्यामध्ये शिरतात, वेगळ्या ध्वनिलहरी कानावर पडतात. गेलेला क्षण पुन्हा परत येत नाही. पण आपल्या आठवणीत साठवले गेले असलेले श्राव्य किंवा दृष्य अनुभव आपण नंतर केंव्हाही  भाषेच्या माध्यमामधून व्यक्त करून दुस-या अनेक व्यक्तीपर्यंत पोचवू शकतो.  याशिवाय  आपले  विचार, भावना, कल्पना, योजना, सिद्धांत वगैरे अनेक अदृष्य अशा गोष्टी आपण शब्दांमधून व्यक्त करून लोकांना सांगू शकतो. या संवादांमधून ज्ञानसंपादनाचे अनेक मार्ग तयार होतात आणि त्याच्या कक्षा विस्तारतात. या भाषा लिपीबद्ध असल्यामुळे आपले ज्ञान, विचार, भावना, कल्पना वगैरे आपल्याला जे पाहिजे ते लिखित स्वरूपात साठवून  इतरांपर्यंत पोचवणे जास्तच सुलभपणे शक्य होते. काळाबरोबर ही क्रिया इतकी जास्त वाढली की पुस्तकी शिक्षणामधून संपादन केलेले तेवढेच 'ज्ञान' असे समजले जायला लागले. पोथ्यांमधून शास्त्रे आणि पुराणे वाचून शास्त्रीपंडित झालेला तेवढा 'ज्ञानी' आणि बाकी सगळे अज्ञानी किंवा अडाणी अशी समजूत होऊन बसली. इंग्रजांच्या राजवटीत सुरू झालेल्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणानंतर  विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाऊ लागल्या आणि त्या उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्रे दिली जाऊ लागली. यामुळे तर 'पुस्तकी विद्या म्हणजेच ज्ञान' ही समजूत जास्तच दृढ होत गेली.  ज्या व्यक्तीकडे जास्त पदव्या असतील तो जास्त ज्ञानी समजला जाऊ लागला.

शाळाकॉलेजांमधून केलेल्या ज्ञानसंपादनाचे अनेक उपयोग आणि फायदे आहेत यात काही शंकाच नाही, पण केल्याने देशाटन, पंडित मैत्री वगैरे इतर मार्गही आहेत, त्याचप्रमाणे एकलव्याप्रमाणे निव्वळ स्वतःच्या प्रयत्नामधून चिकाटीने शिक्षण मिळवणारेही अनेक लोक आहेत. पण ज्ञानाबरोबर शहाणपणासुद्धा आपोआप येतोच का ? यावर विचार करावा लागेल. आपल्याकडे असलेल्या कुठल्या ज्ञानाचा कोणत्या हेतूने, कशा प्रकारे, किती आणि कसा उपयोग करून घेणे हे ज्याच्या त्याच्या शहाणपणावर अवलंबून असते, तसेच माणसाचा स्वभाव, संस्कार वगैरेंवरही ते ठरते.  एकाद्याकडे जेवढे जास्त आणि सखोल ज्ञान असेल तेवढ्या प्रमाणात  त्याचा उपयोग करण्याची संधी  त्याच्याकडे असते, पण प्रत्यक्षात तसे घडेलच असे सांगता येत नाही. याला अनेक कारणे असतात. पहिले कारण म्हणजे कुणाकडेही सगळ्याच विषयांचे सगळे ज्ञान असत नाही. एकाद्याला सर्वज्ञ असे नुसते म्हणतात, पण तो माणूसही  अनेक बाबतीत अज्ञानी असू शकतो. किंबहुना तो विशिष्ट ज्ञानसंपादनामध्ये इतका गढून गेलेला असतो की त्याचे इतर बाबींकडे पुरेसे लक्ष नसल्यामुळे त्याचे अनुभवविश्व तोकडे पडते. विद्वान प्राध्यापकांचा विसरभोळेपणा हा प्रख्यात गुण आहे. शहाणपणा हा उपजत तर असतोच, शिवाय अनेक प्रकारच्या अनुभवामधून धडे घेण्यातून तो वाढतो, तसेच निरनिराळ्या प्रकारच्या माहितीची एकमेकांशी सांगड घालण्यातून तो दिसून येतो. यामुळे ज्ञानी आणि शहाणे असे वेगळे वर्ग झालेले दिसतात. ज्ञानी किंवा विद्वान लोकांचा सर्वांकडून आदर केला जातो, पण शहाणे, हुषार किंवा चतुर लोक अधिक यशस्वी झालेले दिसतात. विद्वानांना सल्लागार म्हणून ठेवले जात असेल पण शहाण्या लोकांकडे योग्य निर्णय घेण्याची क्षमता असते.  काही अद्वितीय लोकांकडे दोन्ही गुण असतात. ते शिखरापर्यंत जाऊन पोचतात.

शहाणा, हुषार, चतुर वगैरे शब्द साधारमपणे समानार्थी असले तरी त्याच्या अर्थांच्या किंचित निराळ्या छटा असतात.  पण खूप शिक्षण घेतलेले किंवा ज्ञानी लोक अनेक वेळा व्यवहारचतुर नसतात. ते सहजपणे गंडवले जाऊ शकतात असे दिसते.    ज्ञानी (knowledgeable) आणि शहाणा (wise) या शब्दांमध्ये बरेच वेळा गल्लत केली जाते. यामुळेच  'अती शहाणा त्याचा बैल रिकामा.' अशी म्हण पडली आहे. इथे बहुधा 'अती शहाणा' या शब्दाचा 'अती चिकित्सक' असा अर्थ अभिप्रेत असावा.  समर्थांनी तर पढतमूर्खांची लक्षणेच सांगितली आहेत. जे लोक शिकले सवरेले असल्यामुळे शहाणे झाले असावेत अशी अपेक्षा असते पण तरीसुध्दा मूर्खासारखे वागतात त्यांना रामदासांनी पढतमूर्ख म्हंटले आहे. यातले बहुतेक लोक हट्टीपणा,  अविचार, अदूरदर्शिता, राग, लोभ, मोह, मद, मत्सर अशा कारणांमुळे चुका करत असतात. काही लोकांची दशा "लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण अशी असते." काही लोकांच्या बोलण्यात आणि कृतीत मेळ नसतो.  काही लोक ऐकावे जनांचे हे विसरून जातात आणि फक्त मनाचेच करत राहतात, काही लोक काळाचे भान ठेवत नाहीत. समर्थांनी अशा सगळ्या दुर्गुणांचे नेमके वर्णन सुमारे चाळीस ओव्यांमध्ये केले आहे. त्या वाचून पाहिल्या तर असे वाटते की बहुतेक सगळेच पढत लोक थोड्या प्रमाणात मूर्ख असतात. लोकांनी त्यांची लक्षणे लक्षात ठेऊन ती टाळावीत आणि आपली वागणूक सुधारावी हा या दासबोधामागचा उद्देश आहे.

थोडक्यात सांगायचे झाल्यास ज्ञानोपासना करावी, काही क्षेत्रांमध्ये प्राविण्य संपादन करावे, पण ते करत असतांना आपला तोल सांभाळावा, जगरहाटी शिकून घ्यावी, आपली गणना पढतमूर्खांमध्ये होणार नाही याचीही काळजी घ्यावी.

----------



No comments: