मी शाळेत शिकत असतांना मला अवांतर काहीतरी लिहिण्याची हौस होती आणि त्या लिखाणाचे घरी आणि शाळेत थोडे फार कौतुक होत होते. पण कॉलेजातला अवाढव्य अभ्यास आणि नोकरीतले काम यामुळे मी ते विसरून गेलो होतो. पुढे अणुशक्तीनगरच्या वसाहतीत रहात असतांना तिथल्या काही मराठी बंधूभगिनींनी हितगुज नावाचे मंडळ स्थापन केले असे ऐकले. त्यांच्या मासिक बैठकींमध्ये वेचक मराठी कथा, कविता, विनोद, प्रवासवर्णन अशा प्रकारचे साहित्य वाचून दाखवले जात असे. त्यांनी मलाही त्या मंडळात प्रवेश दिला आणि चार ओळी लिहायला आणि त्या वाचून दाखवायला प्रोत्साहन दिले. त्या निमित्याने मी तीस पस्तीस वर्षांनी पुन्हा एकदा लेखणी हातात घेतली. पण त्या काळात ऑफिसातल्या कामाचा बोजा वाढतच होता. तो सांभाळतानाच नाकी नऊ येत होते. त्यातून कुठल्याच अवांतर कामासाठी वेळ मिळत नव्हता.
सेवेमधून निवृत्त झाल्यानंतर नोकरीमधली बऱ्यापैकी अवजड जबाबदारी व ती पेलण्यासाठी वेळीअवेळी अंगावर पडत असलेल्या कामांचा बोजा या दोन्हीचा भार डोक्यावरून उतरला. आता मिळणार असलेला भरपूर फावला वेळ आंतर्जालावर स्वैरपणे भटकण्यांत सत्कारणी लावण्यासाठी नव्या घरी ब्रॉडबॅंड नेटवर्कचे कनेक्शन घेतले. त्या काळात ती नवीन गोष्ट होती आणि त्यासाठी बराच खर्च करावा लागत होता. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर रोजच्या जीवनात जी पोकळी निर्माण होते ती भरून काढण्यासाठी काही छंद जोपासावेत असा उपदेश केला जातो. म्हणून मी आपल्याला जमेल आणि परवडेल असा कुठला नवा छंद धरावा याचाही विचार करायला लागलो. त्यातच श्रमपरिहार आणि हवापालट वगैरेसाठी थोडे दिवस मुलाकडे इंग्लंडला जाऊन रहायची टूम निघाली आणि आम्ही अलगदपणे लीड्सला जाऊन पोचलो. तिथल्या थंडगार वातावरणात थोडेसे रुळल्यावर एक फारसा वापरात नसलेला मुलाकडचा "मांडीवरचा" संगणक (लॅपटॉप) आपल्या ताब्यात घेतला आणि त्याला टेबलावर ठेऊन गोंजारत असतांना त्याच्या सहाय्याने आंतर्जालाशी संपर्क साधला. मी लीड्समध्ये घरी बसल्या बसल्याच आंतर्जालावर स्वैर भ्रमण करतांना अगदी योगायोगाने ब्लॉग या संकल्पनेशी माझी पहिली ओळख झाली.
ब्लॉग या संकल्पनेशी ओळख झाल्यानंतर दोन तीन दिवसातच मी एकावरून दुसरा, त्यावरून तिसरा अशा टणाटणा उड्या मारीत मिळतील ते दहा पंधरा ब्लॉग्ज पाहिले आणि ही कल्पना मला अतिशय आवडली, इतकेच नव्हे तर त्यातून माझ्या मनात चाललेल्या एका द्वंद्वावर उत्तर सापडले. मी हितगुजच्या निमित्याने मराठीत पेनने कागदांवर दहा वीस पाने लिहिली होती आणि मराठीत काही लिखाण करावे अशी मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात वर्षानुवर्षे दडून बसलेली सुप्त इच्छा जागी होत होती. रिटायरमेंटनंतर इंग्रजीत काही न लिहिता आता आपल्या मनात येईल ते मराठीतच लिहावे असेही वाटत होते. पण ते वाचणार कोण? कुणी वाचणारेच नसतील तर कशाला लिहायचे? अशा प्रश्नांनी उत्साहावर विरजण पडायचे. एक तर माझे गिचमिड हस्ताक्षर आणि केलेल्या खाडाखोडी कुणाला दाखवायला संकोच वाटायचा आणि आजकालच्या जमान्यात मी ते कागद दाखवायला कुणाकडे घेऊन जावे हा ही एक प्रश्नच होता. मी यावर हे जे काही लिहिले आहे ते तू वाचून बघ असे कुणालाही जाऊन सांगणे मला तरी माझ्या जन्मजात भिडस्तपणामुळे अशक्य होते.
संगणक आल्यावर कागदावर पेनने लिहायची गरज संपली होती. की बोर्डवरची बटने दाबून अत्यंत सुबक अक्षरात लिहिणे आणि खाडाखोड न करता त्यात सुधारणा करणे शक्य झाले होते. त्यामुळे मला इच्छा होईल आणि सुचेल तेंव्हा ते लिहून संगणकावर साठवून ठेवता येत होते. ब्लॉगच्या आयडियाने हे लिखाण आंतर्जालावर टाकायची सोय सापडली होती. जसे इतर लोकांचे ब्लॉग कधी ना कधी कुणी ना कुणीतरी वाचत असतील तसे कुणीतरी माझे लिखाणही वाचेल अशी आशा वाटत होती. लवकरच येऊ घातलेल्या नववर्षाची सुरुवात आपण आपला स्वतःचा ब्लॉग सुरू करूनच करायची असा दृढनिश्चय मी करून टाकला. केला तर खरा, पण तो पूर्ण कसा करायचा यासंबंधी त्या वेळी मला कांहीच ज्ञान नव्हते.
त्या दोन तीन दिवसात मी आंतर्जालावर एकंदरीत जेमतेम दहा पंधरा ब्लॉग्ज उडत उडत वाचले होते, ते सगळे इंग्रजीमध्ये होते. त्याशिवाय इतर जे अनेक ब्ल़ॉग दिसले होते ते चिनी, जपानी, कोरियन अशा अज्ञात लिपींमध्ये होते किंवा फ्रेंच, जर्मन, रशियन अशा भाषांमधले होते. पण ते पाहून आपल्याला मराठीतसुद्धा ब्लॉग लिहिता येईल अशी आयडियाची कल्पना माझ्या डोक्यात आली. त्या लेखकांनी त्यांच्या रचनांना आंतर्जालावर कसे चढवले (अपलोड केले) असेल याचाच मी विचार करत होतो. त्या माहितीसाठी आंतर्जालावर भटकतांना तिथेच "तुम्हीही आपला ब्लॉग निर्माण करू शकता.", "ते अगदी सोपे आहे.", "फक्त आमच्या आज्ञावलीनुसार पावले टाकीत चला", "कधी सुरुवात करीत आहात?" अशा प्रकारच्या गळेपडू जाहिराती पाहिल्यामुळे बराच धीर आला. त्या वेळी माझे बोट धरून वाट मला दाखवणारा कुणीच तिथे नव्हता. मग मी स्वतःच त्या जाहिरातींचा पाठपुरावा करत ब्लॉगस्पॉटला गाठले आणि ब्लॉग कसा लिहायचा असतो ते वाचून समजून घेतले. त्या काळात अजून ई पेमेंट सुरू झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी डॉलर मागितले असते तर ते कसे पाठवायचे हा सुद्धा एक प्रश्नच होता. पण ते लोक हे काम अगदी फुकट करणार होते हे वाचून हायसे वाटले.
मी तर आपला ब्लॉग मराठीमध्येच लिहायचा असे ठरवले होते. मराठीमधील कोणताही ब्लॉग तोपर्यंत माझ्या वाचनात आलेला नसल्यामुळे त्यात नवलाईचाही थोडा भाग होता. पण तिथे माझ्याकडे असलेल्या संगणकावर मराठीमध्ये कसे लिहायचे हा दुसरा प्रश्न समोर आला. माझा ओळखीचा बहुभाषिक संगणक मुंबईलाच राहिला होता आणि इंग्लंडमधल्या या साहेबी मांडीवरल्याला मराठीचा गंधही नव्हता. आंतर्जालावरच शोधाशोध केल्यावर युनिकोडची माहिती सापडली आणि पदोपदी अनेक चुका करीत व त्या दुरुस्त करीत, धडपडत कां होईना, पण मी आपल्या संगणकावर देवनागरी लिपीची प्रतिष्ठापना करून मराठी लिहिण्यासाठी सोय एकदाची केली. तोपर्यंत २००६चे नववर्ष उजाडलेले होते.
ब्लॉगस्पॉटवर माझ्या ब्लॉगची नोंदणी करायला घेतल्यावर सुरुवातीला मी आपले नाव टाइप करायला लागलो Anand Gh इतके टाइप केल्यावर माझ्या लक्षात आले की त्यांना ब्लॉगचे नांव आणि माझे नांव अशी दोन नांवे द्यायची होती. त्या क्षणी मला आनंदघन हा शब्द सुचला आणि Anandghan असे नांव मी या ब्लॉगला देऊन टाकले. अशा रीतीने १ जानेवारी २००६ला माझ्या या बाळाचा आंतरजालावर जन्म झाला. त्यावेळी मी इंग्लंडमधल्या लीड्स या गावी होतो आणि तिथल्या एका लॅपटॉपवर त्याचा जन्म आणि नामकरण झाले.
आपण एकादी नवी गोष्ट करायची असे ठरवतो आणि थोडी धडपड केल्यानंतर ती गोष्ट साध्य होते त्या क्षणी गंगेत घोडं न्हाल्याचा आनंद मिळतो, पण तो फार वेळ टिकत नाही. मी सुरू केलेला तो ब्लॉग जेंव्हा कुणीतरी वाचेल आणि मला ते समजेल तेंव्हा मला थोडे समाधान वाटेल म्हणून मलाच त्याचीही व्यवस्था करणे क्रमप्राप्त होते. तो ब्लॉग आंतर्जालावर अमूक जागेवर उपलब्ध आहे हेच आधी लोकांना समजायला पाहिजे. त्यासाठी माझ्या ई-मेलच्या पत्त्यांच्या यादीत जेवढी म्हणून मराठी आडनांवे दिसली त्या सर्वांना संदेश पाठवून मी आपल्या ब्लॉगचा पत्ता कळवला. पण चार पांच दिवल लोटले तरी कोणाच्या प्रतिसादाचा पत्ताच नव्हता! मग चार पाच जिवलग मित्रांना आठवण करून देऊन मी किती आतुरतेने त्यांच्या उत्तराची वाट पहात आहे तेही कळवले. अपेक्षेप्रमाणे त्यांची उत्तरे तर आली, पण त्यांतील कांही लोकांच्या संगणकांना ते स्थळ सापडतच नव्हते आणि काही लोकांना त्यावरील देवनागरी लिपीतील मजकूर न दिसतां त्या जागी चौकोनी ठोकळ्यांच्या रांगा दिसल्या होत्या. थोडक्यात मी लिहिलेले एक अक्षरसुद्धा माझ्या ओळखीच्या कोणालाही वाचताही आले नव्हते. मग ते त्यावर कसला अभिप्राय देणार?
त्या कालखंडात या लोकांच्या घरात ज्या प्रकारचे इंटरनेट, कॉंप्यूटर, त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टिम्स व ब्राउजर उपलब्ध होते त्यांच्या मर्यादा याला कारणीभूत होत्या हे लगेच माझ्या लक्षांत आले, पण त्या लोकांना त्यांना उपलब्ध असलेल्या तंत्राचा उपयोग करूनच वाचता येईल असेच कांहीतरी त्यांच्यापर्यंत नेऊन पोचवणे आवश्यक होते, कारण अत्याधुनिक तंत्रज्ञानापेक्षा उपलब्ध तंत्रज्ञान जास्त महत्वाचे असते हे मी अनुभवावरून शिकलो होतो. मी त्या दृष्टीने विचार केला आणि माझ्या ब्लॉगवरील लेखांच्या परिच्छेदांचे पेंटमधल्या इमेजेसमध्ये रूपांतर करून ते चित्ररूपाने ब्लॉगवर चढवले. आणखी कांही प्रयोग केल्यावर प्रत्येक चित्राचा आकार तसेच त्यावर लिहिण्याच्या अक्षरांचा आकार निश्चित केला.
मी इंग्लंडमधल्या लीड्समुक्कामी तिथल्या एका जुन्या लॅपटॉपचा उपयोग करून हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती. पण त्या लॅपटॉपची बॅटरी कधीच संपून गेली होती आणि मी त्या संगणकाला एलिमिनेटर चार्जर लावून मेन्सवर चालवत होतो. त्याचा अंतर्गत पंखाही काम करत नव्हता, त्यामुळे तो अर्धा तास काम केल्यावर संतप्त व्हायचा. मग त्याला अर्धा तास झोपवून ठेवावे लागायचे. तिथल्या थंडगार हवेत तो शांत मात्र होत असे. असे करण्यात माझा सगळा दिवस जात असे. पण आठवडाभरातच तो लॅपटॉप दमून कायमचा झोपी गेला.
भारतात जसे किरकोळ दुरुस्त्या करणारे कुशल कारागीर मिळतात तसे तिकडे इंग्लंडमध्ये दिसत नाहीत. त्यामुळे जिथून तो संगणक पूर्वी आणला होता त्या मोठ्या दुकानांत त्याला नेले. त्याच्या गॅरंटी वॉरंटीचा काळ कधीच संपून गेलेला असल्याने तेथील दुकानदारावर त्याची कसली जबाबदारी नव्हती. आता तो दुरुस्त करायचा असेल तर आधी साठ पौंड देऊन तज्ञाकरवी त्याची तपासणी करायची व त्यात जर तो दुरुस्त करण्याजोगा निघाला तर त्याचे एस्टिमेट मिळेल व तेवढा खर्च करावा लागेल, तरीसुद्धा तो आणखी किती काळ काम करेल याची खात्री देता येणार नाही वगैरे तेथील काउंटरवरल्या माणसाने सांगून त्यापेक्षा आम्ही आता नवीन मॉडेलचा लॅपटॉप घ्यावा असा आग्रह केला. आम्ही तो जुना लॅपटॉप इतके दिवस कसा ठेऊन घेतला होता याचेच त्याला आश्चर्य वाटले होते. तोपर्यंत आमची भारतात परतण्याची तारीख ठरलेली असल्यामुळे मी तो नाद सोडून दिला व थोड्या दिवसासाठी अंतर्जालावरूनच सुटी घेतली.
आजकाल आपल्या मोबाइलमध्ये सुद्धा शेकडो जीबी डेटा असतो. काही एमबीचे वॉट्सॅप मेसेजेस सारखे येत असतात आणि ते काही सेकंदांमध्ये उघडतात. या वातावरणात वाढलेल्या लोकांचा कदाचित विश्वासही बसणार नाही, पण २००६मध्ये फार वेगळी परिस्थिति होती. तेंव्हा मी लिहिलेल्या टेक्स्ट फाइल्स बाइटमध्ये असायच्या आणि इंटरनेटचा स्पीड सेकंदाला काही बाइट इतका कमी असायचा. त्यामुळे त्या लहानशा फाइलना अपलोड किंवा डाउनलोड करायलासुद्धा वेळ लागत असे. तेंव्हा व्हीडिओ तर नव्हताच, इमेज फाइल उघडायला किंवा चढवायला इतका वेळ लागायचा की www म्हणजे World wide wait असे म्हंटले जायचे. RAM आणि Floppy disk यांच्या क्षमता केबीमध्ये असायच्या. त्यामुळे एक पानभर इतका मजकूर लिहिला तरी त्याच्या तीन चार इमेज फाइली करून त्यांना ब्लॉगवर अपलोड करायला काही तास लागत असत. शिवाय त्या अपलोड किंवा डाउनलोड करण्यासाठी खर्च येत असे. कदाचित म्हणूनही माझे ब्लॉग उघडून वाचायला कुणी उत्सुक नसावेत.
त्या वेळी मी त्या काळातल्या मराठी ब्लॉगविश्वाविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होतो. तसेही ते अजून बाल्यावस्थेतच होते. त्यांची संख्या शंभराच्याही आतच होती. अमेरिकानिवासी नंदनसारख्या अनेक लोकांनी मराठी भाषेत सुंदर ब्लॉग्ज लिहायला सुरू केले होते हे सुद्धा मला त्या वेळी माहीत नव्हते. माझ्या ओळखीच्या लोकांनी माझा ब्लॉग वाचून त्यावर आपले अभिप्राय द्यावेत अशा मी त्यांच्याकडून बाळगलेल्या अपेक्षा तांत्रिक कारणामुळे पूर्ण होतांना दिसत नव्हत्या. पण अमेरिकेत राहणारे नंदन होदावडेकर आणि आणखी काही अनोळखी अनामिक मित्रांनी मला शुभेच्छा संदेश पाठवून माझे मराठी ब्लॉगच्या विश्वांत स्वागत केले. माझ्या डोक्यांत ही कल्पना जरी स्वतंत्रपणे आली असली तरी, त्याच्या बरेच आधीच दुसऱ्या अनेक लोकांनी मराठी ब्लॉग सुरू करून त्यांत मोलाची भर घातलेली होती. इतकेच नव्हे तर त्या विषयाला वाहिलेले मराठी ब्लॉगविश्व नावाचे संकेतस्थळ सुरू करून तेथून नवख्या लोकांना मार्गदर्शन केले जात होते. मी अगदी पहिला वहिला नसलो तरी निदान पहिल्या शंभरात आपण आहेत याचेच मला मोठे कौतुक वाटले होते. "महाजनो येन गतः स पंथः।" या उक्तीप्रमाणे पुढे गेलेल्या महाभागांच्या वहिवाटेने रुळलेली एक पायवाट मला सापडली होती. ती धरून पुढे जाणे आता सोपे झाले होते.
मी इंग्लंडला जायच्या आधीच मला एका अनोळखी मित्राकडून त्याचा याहू ग्रुप जॉईन करण्यासंबंधी आमंत्रण ई-मेलने आले होते. यापूर्वी मी अशा समूहांबद्दल कांही सुद्धा ऐकलेले नव्हते. तरीही कुतुहल म्हणून त्या समूहात शिरल्यानंतर मला ई-मेलवर रोज दहा पंधरा पत्रे यायला सुरुवात झाली. त्यातली सातआठ पत्रे मुलींच्या नांवाने लिहिलेली असायची. त्यातल्याच एका पत्रमैत्रिणीने याहू ३६० वर इंग्रजीमधून ब्लॉग सुरू केला आणि त्यावरील आपल्या मित्रपरिवारात सामील होण्यासाठी मला आमंत्रण दिले. ते स्वीकारण्यासाठी मला स्वतःला याहू ३६० चा सदस्य बनणे आवश्यक होते व ते सोपेही होते. अशा तऱ्हेने एके दिवशी ध्यानी मनी नसतांना माझा याहू ३६० वर प्रवेश झाला. याहू ३६० या संकेतस्थळावर ब्लॉग लिहिण्यासाठी जास्त सोयी दिलेल्या होत्या. त्यामुळे तिथे ब्लॉग सुरू करतांना मला ते काम सोपे वाटले. शिवाय आपली आवडती चित्रे दाखवण्यासाठी तिथे वेगळी मोकळी जागा दिलेली होती. याचा विचार करता जमेल तितक्या नियमितपणे आधी या नव्या ब्लॉगवर टेक्स्टमध्ये लिखाण करायचे आणि अधून मधून त्यातल्या मजकुराची इमेजेस तयार करून ती ब्लॉगस्पॉटवर चढवायची असे मी ठरवले. अशा प्रकारे नव्या मित्रांसाठी एक आधुनिक ढंगाचा आकर्षक दिसणारा असा हा याहू ब्लॉग आणि उपलब्ध तंत्रज्ञानातील कमतरतेमुळे तो न पाहू शकणाऱ्या जुन्या मित्रांसाठी दुसरा ब्लॉग अशा माझा दुहेरी प्रवास सुरू झाला.
मराठी ब्लॉगविश्वावर ज्या ९०-९५ ब्लॉग्जची नावे होती त्यातले निम्मे लोक आरंभशूर होते. त्यांनी एक दोन प्रयत्न करून झाल्यावर तो नाद सोडून दिला होता, २०-२५ लोक महिना दोन महिन्यात एकदा हजेरी लावून जात होते आणि २०-२५ लोक मात्र नियमितपणे लिहित होते. नंदनच्या ब्लॉगवर तो सुप्रसिद्ध मराठी लेखकांच्या निवडक साहित्यकृतींची ओळख करून देत होता. त्याची निवड फार छान होती आणि त्याचे लेखनही मुद्देसूद तसेच रंजक असे. त्यामुळे माझ्या मते तो त्यावेळी सर्वोत्तम ब्लॉग होता. आणखी कुणी आधी एकेक सुंदर चित्र किंवा फोटो दाखवून त्यावर शब्दांकन करत होता, तर कुणी वृत्त किंवा छंदबद्ध किंवा मुक्तछंद कवितांमधून आपले मन मोकळे करत होता. कुणी प्रवासवर्णन किंवा स्वानुभव सांगत होता, तर कुणी विविध विषयांवरील आपले विचार व्यक्त करत होता. पण असे थोडे अपवाद सोडले तर बहुतेक लेखन रोजनिशी किंवा दैनंदिनीतल्या पानांसारखे असे.
ब्लॉग हा शब्द वेबलॉग या शब्दाचा शॉर्टफॉर्म आहे. यातील लॉग या शब्दाचा अर्थच नोंद असा होतो. कांही लोकांनी ब्लॉगला अनुदिनी, वासरी अशी नांवे दिलेली वाचली आहेत. पण त्यांचा दैनंदिनी वा रोजनिशी असा अर्थ घेतला तर दररोज त्या दिवशी घडलेल्या प्रसंगाबद्दल त्यांत लिहायला पाहिजे असे ध्वनित होते. मला तसली बंधने नकोत म्हणून मी मराठीत वेगळे नांव न देता ब्लॉग असेच म्हणायचे ठरवले. रोजच्या रोज वेळेची डेडलाईन गाठण्यासाठी कसेतरी कांहीतरी लिहिण्याची घिसाडघाई करण्यापेक्षा एखाद्या विषयावर दोन चार दिवस विचार करून, माहिती मिळवून, योग्य शब्द जुळवून, वाचायला निदान बरे तरी दिसेल असे लिखाण प्रस्तुत करणे मला पसंत होते. सुरुवातीला मी सुध्दा काही प्रासंगिक महत्वाच्या घटनांवरच लिहित असे, त्यानंतर मात्र असे इकडे तिकडे न भरकटतां एक विषय घेऊन त्या दिशेने सुसूत्र असे टिकाऊ लेखन सलगपणे निदान कांही दिवस करावयाचे ठरवले.
एका वद्य त्रयोदशीच्या पहाटे फिरतांना आकाशात दिसलेल्या नाजुक व रेखीव चंद्रकोरीवरून आपल्या ब्लॉगसाठी तोच विषय घ्यावा असे मला चटकन सुचले. आमच्या मित्रांना गंमत म्हणून दाखवण्यासाठी जमवलेल्या चंद्रविषयक चित्रांचा एक छोटासा संग्रह माझ्याकडे होता. त्यांना शब्दरूप तेवढे द्यायचे होते. ते काम करता करता त्याचा विस्तार होत गेला आणि त्यासाठी नवी माहिती मिळवीत व देत गेलो. 'तोच चन्द्रमा नभात' या मालिकेचा शेवट होईपर्यंत तिचे तेहतीस भाग झाले. चंद्राच्या भ्रमणाविषयी बऱ्यापैकी तपशीलवार शास्त्रीय माहिती, भारतीय तसेच पाश्चिमात्य पौराणिक वाङ्मयात आढळणारे त्याचे उल्लेख व त्याचेसंबंधी ऐकलेल्या दंतकथा, पदार्थविज्ञानशास्त्राच्या प्रगतीमध्ये अत्यंत महत्वाचे स्थान असलेला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत चंद्राच्या अभ्यासावरून कसा निष्पन्न झाला याची सर्वसामान्य लोकांना ठाऊक नसलेली माहिती, चंद्राशी संबंधित सण, उत्सव व व्रतवैकल्ये, चंद्राचा उल्लेख असलेली लोकप्रिय हिंदी व मराठी गाणी अशा अनेक अंगांनी चंद्राकडे पाहून त्याचे दर्शन वाचकांना घडवण्याचा एक प्रयत्न या मालिकेतून केला.
माझ्या लीड्समधल्या दोन तीन महिन्याच्या मुक्कामात मी त्या शहरातली सगळी प्रेक्षणीय ठिकाणे आणि म्यूजियम्स पाहून घेतली होती, तिथल्या लायब्ररीमधून त्या शहराची माहिती असलेली पुस्तके आणून वाचली होती, बरेचसे फोटो घेतले होते आणि पँफ्लेट्स जमवली होती. 'तोच चंद्रमा नभात' मालिका लिहून संपवल्यानंतर त्या सगळ्या सामुग्रीचा उपयोग करून मी 'लीड्सच्या चिप्स' या नावाने एक नवी मालिका लिहायला घेतली. भारतातून इंग्लंडला जाण्यायेण्याचा विमान प्रवास, तेथील स्थानिक जागांना दिलेल्या भेटी, तेथील स्थानिक इतिहास, तिकडील जनतेबरोबर आलेल्या संपर्कातून कळलेल्या गोष्टी, तेथील सुप्रसिद्ध तशाच कुप्रसिद्ध व्यक्ती आणि वल्ली, तिकडील समाजसुधारक संस्था असे अनेक पैलू या मालिकेत दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र या मालिकेतील प्रत्येक भाग एक स्वतंत्र लेख वाटावा असे त्याचे स्वरूप ठेवले. ते काम सुरू असतांनाच माझे एक गंभीर आजारपण उद्भवले आणि त्यातून थोडे सावरेपर्यंत माझा संगणक रुसून बसला त्यामुळे तीन महिने खंड पडला.
तोपर्यंत सन २००६चा गणेशोत्सव सुरू झाला. शारीरिक असमर्थतेमुळे मला प्रत्यक्षात इकडे तिकडे जाणे अशक्य झाले होते. त्यामुळे घरी बसूनच वर्तमानपत्रातील बातम्या, दूरचित्रवाणीपरून प्रसारित होणारे कार्यक्रम व अंतर्जालावर येणारे सचित्र वृत्तांत यामधूनच मी गणरायाच्या 'कोटी कोटी रूपांचे' दर्शन घेतले आणि 'कोटी कोटी रूपे तुझी' या मालिकेतून ती सगळी वाचकांना घडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन नवरात्रानंतर पुन्हा लीड्सच्या चिप्स लिहायला घेतल्या. ते काम चाललेले असतांना काय झाले कुणास ठाऊक, पण २००७च्या सुरुवातीला अचानक हा ब्लॉग बंद पडला. माझ्या संगणकावरून तो उघडलाच जात नव्हता. हे सगळे काम ब्लॉगस्पॉट विनामूल्य करत असल्यामुळे त्यांच्या मेहेरबानीवरच तो चालत होता. आता कुणाकडे दाद मागावी किंवा कोण मला मदत करू शकेल हेच समजत नव्हते. पण मी माझे सगळे लेखन आधी याहू३६० वर टाकत असल्यामुळे ते शाबूत राहिले होते.
त्या वेळी ब्लॉगस्पॉटवरील ब्लॉग किती वाचकांनी पाहिला होता हे समजण्याची व्यवस्था नव्हती. मी काही मित्रांना आणि नातेवाइकांना फोनवर आणि ईमेलवर विचारून पहायचा प्रयत्न केला होता पण त्यांच्याकडून फारसा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत नव्हता. याहू ३६० वर मात्र सुरुवातीपासूनच वाचनसंख्या दाखवणारे मीटर लावलेले होते. ते सुद्धा सुरुवातीला अतीशय मंद गतीने पुढे सरकत होते. त्या काळात आपला ब्लॉग फारसे कोणीच वाचतच नाही असे वाटून मन खिन्न व्हायचे. त्या वैषम्याचे प्रतिबिंब माझ्या लिखाणातसुद्धा पडू लागले होते. कधी कधी आपण हा उद्योग नेमका कशासाठी करत आहोत असा प्रश्न स्वतःलाच सतावायचा. तेंव्हा माझ्या कांही हितचिंतकांनी मात्र मला पत्रे पाठवून खूप प्रोत्साहन दिले. कुणी 'धीर धरी रे धीरापोटी, फळे रसाळ गोमटी' या उक्तीची आठवण करून दिली तर कुणी 'कर्मण्ये वाधिकारस्ते ना फलेषु कदाचन' या श्लोकाची. आता हे कर्म मी स्वतःच स्वतःच्या अंगावर ओढवून घेतले आहे हे कुणाला सांगणार?
पण या सगळ्या सदुपदेशांचा थोडा चांगला परिणाम होऊन मी हा नसता उद्योग चिकाटीने सुरू ठेवला. हळू हळू तो लोकांच्या नजरेला पडायला लागला. मी मालिकांच्या रूपात लिहायला घेतले असल्यामुळेही ती पूर्ण करण्यासाठी ती कोण वाचत आहे की नाही इकडे लक्ष न देता लिहिणे चालू ठेवले होते. पहिले दोन तीन महिने जेमतेम शंभर दोनशेच्या घरात घुटमळत असलेल्या वाचनसंख्येने पांचव्या महिन्यापर्यंत हजाराचा आंकडा पार केला तेंव्हा मला धन्य वाटले होते. त्यानंतर दर दीड दोन महिन्यात एक एक हजाराने वाढत गेला आणि २००६ वर्ष संपेपर्यंत दहा हजारांचा पल्ला गाठला. दिवसेदिवस त्या ब्लॉगची वाचनसंख्या वाढत गेली. दुसऱ्या वर्षात हा वेग वाढत राहिला आणि वाचनसंख्येतील सहस्रांचे रौप्यमहोत्सव आणि सुवर्णमहोत्सव साजरे होत २००७ वर्षअखेरपर्यंत साठ हजारांचा पल्ला गाठून एप्रिल २००८ मध्ये पाऊण लक्ष (७५०००) झाला . पण तेंव्हाच याहूवर नवी नोंद करतांना खूप अडचणी यायला लागल्या. याहूने लवकरच ती सेवा बंद करायची सूचना दिली होती आणि हळूहळू ती अंमलात यायला लागली होती.
पण काय गंमत आहे? एक दरवाजा बंद होतो तेंव्हा दुसरा उघडतो असे म्हणतात. इथे एकदा आधी बंद झालेला दरवाजा माझ्यासाठी पुन्हा उघडला.२००८ सालीच हे चित्र पुन्हा बदलले. मध्यंतरीच्या काळात माझ्या संगणकाची हार्डडिस्क बदलून तिचा नवा जन्म झाला होता. सहज प्रयत्न करून पाहता चक्क माझे २००७ साली बंद पडलेले ब्लॉगस्पॉटवरील खाते अचानक उघडले. एवढेच नव्हे तर त्यावर चार शब्द लिहून पाहिले तर ते लगेच त्यावर उमटले देखील! त्यामुळे त्या ब्लॉगचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय मी घेतला. काही काळ मी माझे नवे लेख पुन्हा एकाच वेळी दोन्ही ठिकाणी चढवले, तसेच त्या ब्लॉगवर पूर्वी न दिलेले याहूवरील कांही निवडक जुने लेख इथे देणे सुरू केले.
याहू३६० वरील माझ्या ब्लॉगची वाचनसंख्या पाऊण लक्ष वर गेली होती तेंव्हापर्यंत म्हणजे पहिल्या सुमारे सव्वादोन वर्षांमध्ये मी चारशे भाग लिहिले होते. पण त्यानंतर ते स्थळ बंद होत असल्याची लक्षणे दिसायला लागली आणि योगायोगाने त्याच सुमाराला ब्लॉगस्पॉट पुन्हा सुरू झाले होते. दरम्यानच्या काळात गूगलने ब्लॉगस्पॉट विकत घेतले होते आणि त्याला ब्लॉगर असे नाव देऊन त्याच्या कामात लक्षणीय बदल केले होते. तिथे ब्लॉग लिहिणे आणि त्यात चित्रे टाकून त्याला सजवणे सुगम झाले होते आणि प्रोसेसिंगचा वेगही वाढला होता. यामुळे मी याहू३६० वर लिहिलेल्या सगळ्याच ब्लॉग्जना पुन्हा ब्लॉगस्पॉटवरही द्यायचे असे ठरवले. ब्लॉगस्पॉटवरील ब्लॉग बंद व्हायच्या आधीही मी माझे ब्लॉग या दोन्ही ठिकाणी देत होतोच. पण याहू३६० ब्लॉगवरील लेखांच्या परिच्छेदांचे पेंटमधल्या इमेजेसमध्ये रूपांतर करून ते चित्ररूपाने ब्लॉगस्पॉटवर चढवत होतो. यात मला खूप जास्त काम करावे लागत होते आणि त्या कामाला जास्त वेळही लागत होता. पण याहू३६० वर युनिकोडमध्ये देवनागरी लिपीमध्ये प्रसिद्ध होणारे लेख माझ्या भारतातल्या मित्रांना वाचता येत नव्हते म्हणून त्यांच्या सोयीसाठी पहिले वर्षभर मी हे दुप्पट काम काम करत होतो. पहिले सुमारे पाऊणशे भाग झाल्यानंतर ब्लॉगस्पॉटवरचा ब्लॉग बंदच पडल्यामुळे ही झंझट संपली होती
दोन वर्षांमध्ये परिस्थिती खूपच बदलली होती. याहू३६० वरच माझ्या ब्लॉगच्या वाचनांची संख्या पाऊण लाखावर गेली होती. त्यामुळे माझ्या लेखनाला तशाच प्रकारचे वाचक ब्लॉगस्पॉटवरही मिळतील अशी अपेक्षा होती. वाचक मिळावेत यासाठी लेखांचे चित्रांमध्ये रूपांतर करण्याच्या आडवळणी मार्गाची आवश्यकता वाटत नव्हती. त्यामुळे नवीन लेखनाच्या सोबतीने याहू३६० वरील लेखांचे थोडे संपादन करून त्यांना ब्लॉगस्पॉटवर चढवण्याचा सपाटा सुरू केला. २००८ या पहिल्या वर्षातच २५१ भाग चढवले. हा एका वर्षात लिहिलेल्या भागांचा सर्वोच्च आकडा आहे. याच वेगाने काम करून २००९च्या पहिल्या तीन महिन्यात या ब्लॉगवरील चारशे भागही लिहून पूर्ण केले. तर जुलैपर्यंत ५०० भाग झाले. तोपर्यंत याहू३६० वरील ब्लॉग मात्र कायमचा बंद पडला होता. मी वेळेवर तिकडचे बहुतेक सगळे ब्लॉग इकडे आणल्यामुळे ते नाहीसे होण्यापासून वाचले होते. मला हे काम करत असतांना विचार करून नवे लेखन न करता आधी लिहिलेल्या लेखांचे फक्त थोडेसे संपादन करायचे होते त्यामुळे ब्लॉगवर लेख चढवण्याचा वेग वाढला होता. त्यानंतर साहजिकपणेच तो मंदावला.
आम्ही केसरी टूर्सबरोबर तीन आठवड्याची युरोपची सहल करून आलो होतो, तेंव्हा खूप फोटो काढले होते आणि माहिती गोळा केली होती. सन २००९ मध्ये मी त्यावर 'ग्रँड युरोप' या नावाने ३७ भागांची सविस्तर लेखमालिका लिहिली. काही वाचकांना ती इतकी आवडली की "तुमचे लेख वाचत वाचत आम्ही युरोपचा दौरा केला, आम्हाला त्यांची खूप मदत झाली." असे त्यांनी नंतर मला आवर्जून कळवले. आमच्या टूरवरील ग्रुपमध्ये ३० इतर सहप्रवासी होते. भारतात परत आल्यानंतरही आम्ही त्यांच्याशी संपर्क ठेवला होता. मी या ३७ लेखांचे प्रिंटआउट काढून आणि त्यांच्या झेरॉक्स कॉपी काढून त्यांचे स्पायरल बाइंडिंग करून सचित्र पुस्तिका तयार केल्या. त्याच्या २०-२२ प्रति या सहप्रवाशांनी मागून घेतल्या. यासाठी मला आलेला खर्च भरून निघेल अशा हिशोबाने मी त्याचे मूल्य ठेवले होते, ते त्यांनी आनंदाने दिले. मी लिहिलेल्या लेखांची पुस्तिका करून ती विकायचा माझा हा पहिला आणि शेवटचा अनुभव होता. त्याच्या आधी आणि नंतरही काही मित्रांनी मी माझे लेखन छापून प्रकाशित का करत नाही असे विचारले होते किंवा तशी सूचना केली होती, पण त्यासाठी मुद्रक, प्रकाशक वगैरे लोकांचे उंबरे झिजवणे मला कधीच मान्य होण्यासारखे नव्हते किंवा मला तशी इच्छा होत नव्हती आणि गरज वाटली नाही. पण काही लोकांनी मला विचारून माझे काही लेख त्यांच्या मासिकांमध्ये छापून आणले आणि काही मासिकांसाठी मी लेख लिहून दिले आणि आजही देत आहे.अशा प्रकारे माझ्याही चार ओळी छापून आल्या आहेत, येत आहेत आणि काही वाचकांनी त्या वाचल्या असतील.
इ.सन २०१०च्या मध्यापर्यंत माझ्या ब्लॉगच्या शतकांचे षटक (६०० भाग) पूर्ण झाले. या सहाही षटकांमध्ये माझी लेखणी चौखूर उधळली होती. विज्ञान तंत्रज्ञान या माझ्या होमपिचपासून प्रवास वर्णने, व्यक्तीचित्रे, जीवनात आलेले अनुभव, दैनिक बातम्यांवरील भाष्य, मला भावलेली परमेश्वराची अनंत रूपे, आवडलेले करमणुकीचे कार्यक्रम, कवितांचे रसग्रहण, क्वचित एकादी ज्वलंत समस्या वगैरे बहुस्पर्शी लिखाण मी या ठिकाणी केले होते. यातले बहुतेक लेख १-२ भागात लिहिलेले असले तरी एकाद्या विषयावर मालिका लिहिण्याचे कामही मी पहिल्या वर्षापासून करत आलो होतो. या सहा शतकांमध्ये आलेल्या प्रमुख मालिकांचे विषय खाली दिले आहेत. यातल्या कांही मालिका चार पाच भागात लिहिल्या होत्या तर कांही मालिकांचे तीस पस्तीस भागही झाले होते.
पहिले शतकः- तोच चन्द्रमा नभात (३४), कोटी कोटी रूपे तुझी (११), लीड्सच्या चिप्स (२०)
दुसरे शतकः- थोर भारतीय शास्त्रज्ञ (५), विमानाचे उड्डाण (५), माझीही अपूर्वाई (६)
तिसरे शतकः- विठ्ठला तू वेडा कुंभार (६), गणेशोत्सव आणि पर्यावरण (५), ऑलिंपिक खेळांची कथा (५), आजीचे घड्याळ(१२), आली दिवाळी (५)
चौथे शतकः- शाळेतले शिक्षण (१०), राणीचे शहर लंडन (६), सलिल चौधरी (७), चन्द्रयान (७) झुकझुकगाडी भारतातली आणि परदेशातली (४), मौंजीबंधन (५)
पांचवे शतकः- सांचीचे स्तूप (४), ग्रँड युरोप (३७), जन्मतारीख (५)
सहावे शतकः- आयुधे, औजारे आणि यंत्रे (४), अमेरिकेची लघुसहल (२०), पंपपुराण (१५)
इ.सन २००९-१०च्या सुमारालाच मी फेसबुकवर माझे खाते उघडले होते आणि तिथे बहुभाषिक मित्रमंडळी गोळा करत होतो. रोज त्यांच्याबरोबर दोनचार शब्द संभाषण होऊ लागले. मी अधून मधून मनोगत', 'मिसळपाव' आणि 'उपक्रम' या लोकप्रिय मराठी संकेतस्थळांवर हजेरी लावत राहिलो होतो. काही दिवसांनी त्यात 'ऐसी अक्षरे' आणि 'मी मराठी' यांचीही भर पडली. एका गुढी पाडव्याच्या दिवशी मी वर्डप्रेस या नव्या संकेतस्थानावर 'शिंपले आणि गारगोट्या' हा वेगळा ब्लॉग सुरू करून दिला. आंतर्जालाच्या सागरकिनाऱ्यावर स्वैर भ्रमण करत असतांना वेचलेले शंखशिंपले, रंगीबेरंगी खडे, गारगोट्या वगैरे तिथे साठवत गेलो. यात मला आवडलेले लेख, कविता, माहिती, चित्रे, सुभाषिते, विनोदी चुटके अशा विविध प्रकारच्या गोष्टींचा संग्रह करायला सुरुवात करून दिली. त्यांची ओळख करून देण्यासाठी मीही त्यावर माझे चार शब्द लिहित होतो. याहू ३६० वरील माझा ब्लॉग शेवटचे आचके देत २००९अखेर कायमचा बंद होऊन गेला होता. आधी एकदा 'ब्लॉगस्पॉट'बद्दल अशा प्रकारचा अनुभव येऊन गेला होता. त्यामुळे आणखी एक पर्याय असावा म्हणून मी 'निवडक आनंदघन' या नावाचा एक ब्लॉग 'वर्डप्रेस'वर सुरू करून दिला आणि काही निवडक जुन्या लेखांवर एक संपादनाचा हात फिरवून त्यांना त्या ब्लॉगवर नवा जन्म द्यायला लागलो. 'वर्डप्रेस' या ठिकाणी ब्लॉगवरील लेखांचे वर्गीकरण करण्याची आणि त्यांचे शोध घेण्याची अधिक चांगली सोय असल्यामुळे तिथे माझे जुने लेख शोधणे सोपे जाते हा त्यातला आणखी एक फायदा होता.
या सगळ्या कामांमध्ये माझा बराच वेळ जात असल्यामुळे आनंदघन या माझ्या पहिल्या मूळ ब्लॉगकडे लक्ष द्यायला मला पुरेसा वेळ मिळत नव्हता. त्यामुळे मी संख्येने कमी पण गुणवत्तेच्या दृष्टीने थोडे जास्त चांगले असे थोडे मोठे लेख लिहिण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यानंतर दर वर्षाला सुमारे नव्वद, शंभर भाग देत मी सव्वा तीन वर्षांनंतर ९०० भागांचा आकडा गाठला. पुढे वैयक्तिक जीवनातल्या अडचणींमुळे तो वेग कमी कमी होत गेला. जानेवारी २००६मध्ये सुरुवात केल्यानंतर बरोबर दहा वर्षांनी म्हणजे २०१५ या वर्षाच्य़ा अखेरीला मी १०००वा भाग लिहिला. या काळात मी कौटुंबिक संमेलन (७), पंपपुराण -द्वितीय खंड (१०), मोतीबिंदू आणि भिंगाचे भेंडोळे (५), मन (७), संस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे (७), अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती (११), शाश्वत ऊर्जा कार्यशाळा(५), वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिवस (५), पावसाची गाणी (७), गणपती बाप्पा वर्तमानपत्रांमधला (६), विठ्ठल किती गावा ?(८), मंगल मंगळ, मंगलयान (७), निवडणुका (६) यासारख्या काही लेख मालिका लिहिल्या. तेथे कर माझे जुळती आणि स्मृती ठेवुनी जाती या लेखमालिकांमध्ये मला आदरणीय वाटलेल्या व्यक्तींविषयी प्रत्येकी १०-१५ भाग लिहिले आणि त्या मालिका पुढेही चालू ठेवल्या.
याहू३६० वर रोजच्या रोज वाचक आणि वाचने यांच्या संख्या दाखवल्या जात असत. ते आकडे पाहून थोडे उत्तेजन मिळत असे. तो ब्लॉग बंद पडेपर्यंत वाचनांची संख्या लाखावर गेली होती. ब्लॉगस्पॉट किंवा ब्लॉगरवर आधी ती सोय नव्हती. त्यामुळे आपले लेखन किती लोकांकडून वाचले जात होते ते समजत नव्हते. पण २०१०च्या सुमाराला त्यांनीही हे आकडे द्यायला सुरुवात केली. त्यानंतर दोन वर्षात एक लक्ष वाचनांचा पहिला टप्पा पार करून ही संख्या पाच आकड्यांमध्ये आली. ब्लॉगरने फॉलोअरची योजना कधी सुरू केली हे मला कळलेच नाही, पण या ब्लॉगवर अचानक त्यांची नावे दिसायला लागली. माझ्या ब्लॉगचा मागोवा घेणारे असे नाव मी त्यांना दिले. दोन वर्षांत त्यांच्या संख्येनेही शतक पूर्ण केले.
मे २०१३मध्ये माझ्या आनंदघन या ब्लॉगच्या वाचकांची संख्या सव्वा लाखावर गेली तेंव्हा मी 'झाकली मूठ सव्वा लाखाची' हा लेख लिहिला होता. आपले दौर्बल्य किंवा वीक पॉइंट झाकून ठेवावेत, आपल्या हातातले पत्ते उराला कवटाळून धरावेत म्हणजे ते कोणाला दिसणार नाहीत. असा या म्हणीचा अर्थ आहे, पण मी तर पहिल्या दिवसापासून माझे जवळ जवळ सगळे पत्ते उघडून ते टेबलावर मांडून ठेवत होतो. मला संगणकाची फारशी माहिती नव्हती, आंतर्जालावर भ्रमण करायची संवय नव्हती, मराठी भाषेत आणि देवनागरी लिपीमध्ये लिहिण्याचा यत्किंचित अनुभव नव्हता वगैरे माझे हँडिकॅप्स घेऊन मी हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली तेंव्हाच ते सगळे सांगून टाकले होते. माझ्या या नसत्या उद्योगातून मला कसलाही आर्थिक लाभ मिळण्याची सुतराम संभावना नव्हती, माझ्या अधिकारक्षेत्रात मला मिळून गेला होता त्याहून वेगळा अधिक मानमरातब मिळवण्याची अपेक्षा नव्हती, "येन केन प्रकारेण प्रसिध्द पुरुषो भवेत्।" हे माझ्या जीवनाचे ब्रीदवाक्य नाही. माझे लेखन वाचून ते वाचणाऱ्यामधल्या कोणाला कणभरही फरक पडू शकेल अशी माझी समजूत नाही. असा सगळा नन्नाचा पाढा वाचल्यावर "मी हा खटाटोप कशासाठी चालवतो आहे?" असा प्रश्न कोणालाही पडेल. का कुणास ठाऊक, पण आपल्याला सुचेल ते जमेल त्या शैलीमध्ये लिहावे आणि ते चार लोकांना वाचायला द्यावे. अशी एक इच्छा काही वर्षांपूर्वी माझ्या मनात जन्माला आली होती आणि त्या लेखनाच्या वाचनसंख्येत होणारी वाढ या टॉनिकवर ती ऊर्मी सुदृढ होत होती. केवळ तिच्या प्रेरणेमुळे रिकामा वेळ मिळाला की माझे हात शिवशिवायला लागायचे आणि बोटे कीबोर्डवर चालायला लागायची.
माझ्या या प्रयत्नांची इतर माध्यमांमध्येही किंचित नोंद होत होती. 'स्टार माझा'ने आयोजित केलेल्या ब्लॉगलेखनाच्या स्पर्धेत माझ्या ब्लॉगचा समावेश 'उल्लेखनीय ब्लॉग्ज'मध्ये झाला. माझ्या ब्लॉगची ओळख करून देणारा एक लहानसा लेख 'अनाग्रही सभ्य भूमिका' अशा मथळ्याखाली लोकसत्ता या दैनिकात छापून आला. दोन वर्षे मराठी ब्लॉगर्सची संमेलने दादरला भरली, तिथेही मला हजर राहून निवेदन करण्याची संधी मिळाली. माझ्या ब्लॉगचा मागोवा घेणाऱ्या मित्रांची संख्या हळूहळू वाढतच होती. हे सगळे प्रेरणादायी होते.
नेमके कोण लोक आपले वाचक आहेत हा प्रश्न मला नेहमीच पडत आला होता आणि त्याचे उत्तर मिळत नव्हते, ते अजूनही मिळालेले नाही. माझ्या ब्लॉगच्या आयडीवर कुठकुठल्या देशांमधून टिचक्या मारल्या गेल्या यांचे आकडे तेवढे मिळत होते. त्यानुसार पहिल्या सव्वा लाखापैकी पंधरा हजार परदेशातले होते, त्याच्यामधले फक्त अमेरिकेतले सहा हजार तर उरलेले लोक युरोप आणि आशियातल्या निरनिराळ्या देशांमधले होते. ते सगळे मराठी भाषा जाणणारे होते की चुकून आले होते कोण जाणे. त्यांच्याबद्दल जास्त विचार करण्यापेक्षा माझी ही सव्वा लाखाची मूठ झाकून ठेवलेलीच बरी होती.
२०१५च्या अखेरीला मी मुंबईला कायमचा रामराम ठोकून पुणेकर झालो होतो. तोपर्यंत म्हणजे पहिल्या दहा वर्षांमध्ये माझ्या आनंदघन या ब्लॉगचे १००० भाग होऊन गेले होते. हा आकडा पुढे आणखी वाढवत ठेवायचा नाही असा निर्णय घेऊन मी तो आकडा कमी करायला सुरुवात केली. काही जुने भाग डिलीट केले, २-३ भागांचे एकत्रीकरण केले असे करून एकूण संख्या तीन आकड्यातच ठेवली. ती आजवर ९९९च्या आतच ठेवली आहे. इथे आल्यावर निरनिराळ्या कारणांमुळे आनंदघन या ब्लॉगवर लिहिणे कमी होत गेले होते, तरीही महिन्या दोन महिन्यातून ३-४ जुने भाग काढून टाकून नव्या भागांसाठी जागा करत राहिलो आहे.
मी २०१६मध्ये फक्त १९ भाग लिहिले त्यातले १२ भाग स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान या मालिकेचे होते. २०१७ मध्ये २८ भाग लिहिले त्यातले ९ भाग सिंहगडरोडवर आणि ४ भाग गणेशोत्सवावर होते. त्याशिवाय शिक्षणविवेक मासिका साठी शास्त्रज्ञ आणि संशोधन या विषयावर ४ लेख लिहिले. २०१८ मध्ये तीस लेख लिहिले त्यातले १२ शास्त्रज्ञ आणि संशोधन या विषयावर आणि ५ माझ्या संग्रहवृत्तीवर होते. २०१९ मध्ये मी चार महिने अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलो होतो. तरीही २७ लेख लिहिले त्यातले १२ शास्त्रज्ञ आणि संशोधन या विषयावर आणि ५ अमेरिकेतल्या अनुभवावर होते. २०२० साली कोविडने धुमाकूळ घातला होता, त्यामुळे जीवन थंडावले होते. घराच्या उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकायलाही परवानगी नव्हती. त्यामुळे भरपूर रिकामा वेळ होता, पण त्या वेळी काहीही काम करायला उत्साहच वाटत नव्हता. त्या वर्षभरात मी १२च लेख लिहिले त्यातले पाच अमेरिकेतल्या आठवणींवर होते. २०२१मध्येही कोविडचा धुमाकूळ सुरूच होता. त्या वर्षभरात १५ लेख लिहिले. एकदा मंदावलेल्या गाडीला नंतर वेग आलाच नाही. २०२२मध्ये १२, २०२३मध्ये फक्त ५ आणि २०२४मध्ये १० लेख लिहिले गेले.
या काळात व्हॉट्सॅपचे आगमन झाले होते आणि मी अनेक ग्रुप्सचा मेंबर झालो असल्यामुळे मला रोज शेकडो मेसेजेस येत होते. माझ्या एका मित्राच्या सहकार्याने मी फेसबुकवर 'Learning Sanskrit through Subhashitani सुभाषितांमधून संस्कृत शिकूया' या नावाने एक मालिका सुरू करून दिली. त्यात रोज एक संस्कृत सुभाषित देऊन त्याचा इंग्रजी आणि मराठीत अर्थ देत असतो. हे काम खंड न पडता गेली सहा वर्षे चालले आहे आणि आतापर्यंत २३०० सुभाषिते देऊन झाली आहेत. वर्षभरापूर्वी विज्ञानधारा या मासिकाने मला लेख लिहायची संधी दिली. त्यांच्यासाठी सात आठ विज्ञानविषयक लेख लिहून दिले.
वॉट्सॅप आणि फेसबुकवर रोज नवीन नवीन माहिती मिळत असल्यामुळे ती गोळा करून शिंपले आणि गारगोट्या या ब्लॉगवरील योग्य त्या भागामध्ये संग्रहित करणे हे माझे मुख्य काम झाले होते. त्यामुळे मी रोज त्याच ब्लॉगला भेट देत होतो. वाचकांनीही त्या ब्लॉगलाच जास्त भेटी देऊन मला प्रोत्साहन दिले. त्यात आनंदघनचे काम मागे पडत गेले. शिंपले आणि गारगोट्या हा माझा ब्लॉग मी मार्च २००९ मध्ये सुरू केला होता आणि पहिल्या वर्षात धडाधड शंभर लहान लहान चुटके जमवले होते. पुढच्या तीन चार वर्षांमध्ये हळूहळू आणखी शंभर सव्वाशे किरकोळ नग जमवल्यानंतर मी ते काम थांबवले होते. आधी जमवलेल्यातले निम्म्याहून अधिक भाग मी नंतर डिलिट करून टाकले. सागरकिनाऱ्यावर फिरतांना जमवलेले काही शंखशिंपले आणि रंगीत खडे नंतर आपल्यालाच तितकेसे आवडत नाहीत म्हणून आपण टाकून देतो तसे केले.
२०१८ मध्ये मी पुन्हा नव्याने या ब्लॉगमध्ये रस घेतला आणि त्यात थोडी अर्थपूर्ण भर घालायला सुरुवात केली. मी त्यानंतर आतापर्यंत आणखी दोनशेच भाग लिहिले असले तरी त्या प्रत्येक भागामध्ये नंतरच्या काळात अनेक लेख आणि चित्रे साठवत गेलो आहे. मराठी कवी आणि कविता यांच्या संग्रहात ६०-६५ कवींच्या रचना गोळा केल्या आहेत आणि त्या सुमारे पन्नास हजार वाचकांनी पाहिल्या आहेत. समर्थ रामदास स्वामी आणि दासबोध यांचेवरील लेखांपासून ते कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आकाशातले ग्रह, तारे वगैरेंच्या माहिती पर्यंत अनेक विषयांमधले लेख यात आहेत. आद्य मराठी नाटककार, आद्य उद्योजक तसेच राजकारण, समाजसेवा, शास्त्रीय संशोधन वगैरे विविध क्षेत्रांमधील नामवंत प्रसिद्ध व्यक्तींची माहिती गोळा केली आहे. गीतकार ग दि माडगूळकर, संगीतकार सुधीर फडके आणि लोकप्रिय लेखक पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दिनिमित्य अनेक उत्तमोत्तम लेख मिळत गेले ते साठवून ठेवले. मी अशा प्रकारे एक प्रकारचा लहानसा खजिना तयार केला आहे आणि त्यात रोज भर पडत आहे.
गेली पाच वर्षे दर वर्षी सुमारे एक लाख वाचक या ब्लॉगला भेट देत आहेत आणि आज त्यांची एकूण संख्या साडेसहा लाखावर गेली आहे. ती माझ्या सर्व ब्लॉग्जमध्ये सर्वात जास्त आहे. आनंदघन या माझ्या पहिल्या ब्लॉगवर मी हल्ली जास्त भर टाकत नसलो तरीही तो ब्लॉग पहायला दर रोज सुमारे शंभर वाचक येतात आणि एकूण वाचकांची संख्या आता सव्वा सहा लाखावर आहे. निवडक आनंदघन या तिसऱ्या ब्लॉगमध्ये आतापर्यंत ६२५ लेख दिले असून या ब्लॉगलाही रोज जवळजवळ ७०-८० वाचकांच्या भेटी होत असल्याने या ब्लॉगच्या वाचनसंख्येनेही आता सव्वाचार लाखांचा आकडा पार केला आहे. आजच्या वॉट्सॅप आणि इन्स्टाग्रामच्या काळात ब्लॉगसारख्या आता जुन्या झालेल्या प्रकारालाही अजूनही इतके वाचक मिळत आहेत ही माझ्या दृष्टीने अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. माझ्या ब्लॉग्जच्या सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार.
आनंदघन https://anandghan.blogspot.com/
शिंपले आणि गारगोट्या https://anandghare.wordpress.com/
निवडक आनंदघन https://anandghare2.wordpress.com/
(समाप्त)