Saturday, December 19, 2020

क्रिकेटचे कसोटी सामने

 अलीकडेच मी खूप दिवसांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला कसोटी सामना पाहिला. पहिल्या दिवशी भारतीय संघाने फार चांगली कामगिरी केली नसली तरी अगदी वाईटही केली नव्हती. त्यामुळे मनात संमिश्र भाव होते. दुसरे दिवशी  त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघाला एका दिवसात गुंडाळून कमाल केली आणि मी खूपच आनंदात होतो, पण तिसरे दिवशी मात्र अगदी अनपेक्षितपणे त्यांची लाजिरवाणी घसरगुंडी होऊन नामुश्कीची हार झाली. त्यामुळे आता पुढील सामन्यात ते काय दिवे लावणार आहेत ते पहायचे आहे. पण याआधी झालेल्या एक दिवसांच्या सामन्यांमध्ये हारल्यानंतर त्यांनी ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांत विजय मिळवला होता. त्यामुळे ते कसोटी सामनेही कदाचित जिंकण्याची आशाही आहे. या सामन्याच्या निमित्याने माझ्या साठसत्तर वर्षांपूर्वीच्या आठवणींना मात्र थोडा उजाळा मिळाला.

६०-७० वर्षांपूर्वी म्हणजे १९५० ते १९६० च्या दशकात मी आमच्या लहान गावातल्या शाळेत जात होतो. त्या काळात आम्ही मुले बहुतेक वेळ गोट्या, विटीदांडू, लगोरी, शिवाशिवी, लपंडाव असले गावठी खेळच खेळत होतो. शाळेचे मास्तर पीटीच्या वर्गात आम्हाला हुतूतू, खोखो यासारखे काही सांघिक खेळ खेळायला सांगत असत, पण यात क्रिकेटचा समावेश कधीच नसायचा. तसे कधीकधी आम्हीही एकादे फटकूर हातात धरून थोडे चेंडूशी चाळे करत असू, पण त्याला क्रिकेट म्हणता येणार नाही. आमच्या वर्गातल्या एका मुलाला त्याच्या काकाने की मामाने शहरातून नवा कोरा क्रिकेटचा सेट आणून दिला. तेंव्हा त्याने आपली नवी कोरी बॅट, लाल चुटुक चेंडू आणि गुळगुळीत चमकदार स्टंप्स वगैरे सगळ्यांना कौतुकाने दाखवले आणि त्यांना उगीच माती लागून ते मळू नयेत म्हणून कापडात गुंडाळून जपून ठेवले.   

त्या काळात आमच्या दृष्टीने विमानाचा प्रवास ही एक दुर्मिळ गोष्ट होती. माझ्या नात्यातल्या किंवा ओळखीतल्या आमच्या गावातल्या कुणीही कधीही विमानाने प्रवास केला नव्हता. राइट बंधूंनी विमानाचा शोध लावल्यापासून ते मी मॅट्रिक परीक्षा पास होईपर्यंतच्या पन्नास वर्षांच्या काळात आमच्या गावातला एकच माणूस परदेशी जाऊन आला होता आणि तोसुद्धा पुण्याला जाऊन तिथे स्थाईक झाल्यानंतर. आम्ही मुले त्याचे अमाप कौतुक ऐकतच लहानाचे मोठे होत होतो. त्यामुळे हे जे क्रिकेटचे खेळाडू कधी इंग्लंड तर कधी ऑस्ट्र्लेलियाला फिरून येत असत त्यांचा आम्हाला भयंकर हेवा वाटत असे. 

पण या लोकांनासुद्धा ३-४ वर्षात एक परदेशवारी करायला मिळत असे. उरलेल्या वर्षांमध्ये कुठला ना कुठला परदेशी संघ भारताच्या दौऱ्यावर येत असे. बहुतेक वर्षी ते लोक पाच पाच दिवसांचे पाच कसोटी सामने आणि त्यांच्या मध्ये तीन तीन दिवसांचे इतर सामने खेळत, तसेच काही प्रेक्षणीय स्थळे पाहून घेत असत. या कसोटी सामन्यांना वर्तमानपत्रांमध्ये प्रचंड प्रसिद्धी मिळत असेच, रेडिओवरून त्यांचे धावते समालोचनही (रनिंग कॉमेंटरी) प्रसारित केली जात असे.

त्या काळात आमच्या घरी रेडिओसुद्धा नव्हता, तसेच माझ्या कोणा जवळच्या मित्राच्या घरीही नव्हता. ज्या मित्रांच्या घरी होता त्यांना त्या रेडिओला हात लावू दिला जात नव्हता, पण घरातल्या मोठ्या माणसांनाच जर क्रिकेटची आवड असली तर ते कॉमेंटरी लावत असत आणि ती आमच्या त्या मित्रांच्या कानावर पडत असे. त्यामधून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारावर ते भाव खाऊन घेत असत.  आमच्या ज्या मित्राला क्रिकेटचा सेट भेट मिळाला होता तोही त्यांच्यातलाच एक होता. आता मात्र आजूबाजूचे सगळे वातावरणच क्रिकेटमय झाल्यामुळे त्यालाही उत्सााह आला. त्याने आपले बॅट, बॉल आणि स्टंप्स बाहेर काढले आणि आम्हा मित्रांना बोलावून घेऊन खेळायला सुरुवात केली.  अर्थातच तोच आमचा तज्ज्ञ असल्यामुळे त्यानेच आम्हाला क्रिकेटचे नियमही सांगितले. पाचसात मुलांमध्ये दोन संघ करणे तर शक्यच नव्हते. त्यामुळे सगळेच जण आळीपाळीने बॅट्समन किंवा बोलर होत आणि बाकीचे फील्डिंग करत. त्यासाठी आम्हीच आमचे वेगळे नियम ठरवीत असू आणि ते पाळत असू.

गावातले काही रिकामटेकडे दुकानदार त्यांच्या दुकानात एक मोठा व्हॉल्ह्वसेटचा रेडिओ शोभेसाठी ठेवत असत आणि त्यावर बातम्या किंवा रेडिओ सिलोनवरील हिंदी सिनेमातली गाणी ऐकत बसलेले असत.  क्रिकेटचा कसोटी सामना चालला असला तर ते त्यावर कॉमेंटरी लावून ठेवत आणि गावातली रिकामटेकडी पोरे दुकानाच्या बाहेर उभी राहून ती ऐकायला गर्दी करत असत. तिथे काय चाललंय ते पाहण्यासाठी मीही कधी कधी त्या घोळक्यात उभा रहात असे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या त्या देशभक्तीच्या काळात इंग्रजांबरोबर इंग्रजीलाही हद्दपार करण्याचा सगळ्यांनी चंग बांधला असल्यामुळे आम्हाला आठवी इयत्तेत एबीसीडी शिकवली गेली. त्यामुळे त्या भाषेचे ज्ञान तर नव्हतेच, त्या काळातल्या दिव्य रेडिओ प्रसारणातल्या रेडिओ विद्युत लहरी आमच्या त्या  आडगावापर्यंत जेमतेमच पोचत असाव्यात. त्यामुळे येत असलेल्या प्रचंड खरखरीमधून एकाद दुसरा शब्द ऐकू आलाच तर त्याचा अर्थ माहीत नसायचा आणि क्रिकेटच्या परिभाषेमधला त्याचा संदर्भ तर कुणालाच लागायचा नाही. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने काहीतरी अर्थ काढून तारे तोडत असे.

अनेक वेळा हे समालोचन ऐकल्यानंतर निदान कोणता संघ बॅटिंग करत आहे, कोणाकडे बोलिंग आहे आणि बॅटिंग करणाऱ्या टीमचा किती स्कोअर झाला आहे एवढे तरी बऱ्याच लोकांना समजायला लागले होते. त्यामुळे भारताची बॅटिंग चालली असताांना  रेडिओवर एकदम गलका झाला की आधी लोक कुणीतरी बाउंडरी मारली म्हणून टाळ्या पिटत आणि थोड्या वेळाने दुसऱ्याच बॅट्समनचे नाव कानावर पडल्यावर त्यांच्या लक्षात येई की तो तर आउट होऊन गेला आहे आणि मग त्याला शिव्या घालत. याउलट प्रतिपक्षाची बॅटिंग चालली असतांना त्यांचा खेळाडू आउट झालल्याचे समजताच ते आनंदाने उड्या मारत. अशा मजा मजा चालत असत.

१९५०-६०च्या त्या कालखंडात भारताची टीम कुठलाच कसोटी सामना कधी जिंकतच नव्हती. त्यामुळे तो सामना अनिर्णित ठेवणे हाच मोठा पराक्रम समजला जायचा. अंगावर आलेला चेंडू टकक् टुकुक् करत कसाबसा पुढे ढकलायचा, डोक्यावरून जाणाऱ्या बंपरपासून कसे तरी आपले शिर सलामत ठेवायचे, बाजूने जाणाऱ्या चेंडूला सरळ सोडून द्यायचे आणि बाद न होता पिचवर टिकून रहायचे हा फलंदाजांचा सर्वात मोठा गुण होता अशी समजूत होती. कंटाळा आला तर मध्येच एकादा चेंडू ते जमेल तसा टोलवतही असत. अशा रीतीने संथपणे खेळूनही काही बॅट्समन सेंच्युऱ्या वगैरे काढत असत. त्यांना असे वैयक्तिक उच्चांक करायला संधी मिळावी एवढ्याच उद्देशाने हे सामने खेळले जात असावेत अशी समजूत होती. 

मी कॉलेजला गेल्यानंतरच्या काळात परिस्थिती हळू हळू बदलत गेली आणि आपली भारतीय टीम एकाददुसरा सामना जिंकायला लागली. मी नोकरीला लागल्यानंतरच्या काळात तर ती चक्क मालिकांवर मालिका जिंकायला लागली. मुंबईपुण्याला रेडिओवरील कॉमेंटरी स्पष्ट ऐकायला यायला लागली आणि मलाही इंग्रजी संभाषणाची सवय झाल्याने ती समजायला लागली. प्रत्यक्षात मी कधी मैदानावर उतरलोही नाही, तरीसुद्धा क्रिकेटच्या बाबतीतले माझे सामान्य ज्ञान वाढत गेले आणि बोलिंगमधले गुगली, बाउन्सर किंवा यॉर्कर, बॅटिंगमधले कव्हर ड्राइव्ह, पुल् किंवा स्वीप आणि फील्डिंगमधले मिडऑन, स्लिप किंवा फॉरवर्ड शॉर्ट लेग यासारख्या तांत्रिक शब्दांची त्यात भर पडली. टेलिव्हिजनवर प्रत्यक्ष सामने पहातांना ते सगळे इतके चांगले समजायला लागले की कॉमेंटरीचीसुद्धा फारशी गरज पडायची नाही. कॉमेंटरीतही खूप सुधारणा होत गेल्या आणि त्याही बहुभाषिक बनल्या. या सगळ्यांमुळे माझाही क्रिकेटच्या सामन्यांमधला इंटरेस्ट वाढत गेला आणि इतरांप्रमाणे मीसुद्धा क्रिकेट मॅचेसच्या कॉमेंटरी ऐकण्याचा शौकीन होऊन गेलो. चार लोकांमध्ये बोलतांना क्रिकेट हा विषय नेहमी निघायचाच आणि आपण त्यात अगदीच अनभिज्ञ आहोत असे दिसायला नको असेल तर त्याची माहिती ठेवणे आवश्यक असायचे. 

नंतरच्या काळात आधी ५०-५० षटकांचे आणि नंतर तर फक्त २०-२० षटकांचे सामने खेळायला सुरुवात झाली. त्यात खूप आकर्षक अशी फटकेबाजी आणि कमालीचे क्षेत्ररक्षण कौशल्य पहायला मिळते, तसेच ते कमी वेळात संपून त्यात निकालही लागतात, यामुळे ते लगेच लोकप्रिय झाले आणि पाच पाच दिवस रेंगाळणारे कसोटी सामने कंटाळवाणे वाटायला लागले. पण या इतर सामन्यांची संख्या बेसुमार वाढत गेली. आय पी एल सुरू झाल्यावर कोणत्याही संघात जगभरातले निरनिराळ्या देशातले खेळाडू असल्यामुळे मला तरी कुठलाच संघ आपला वाटायचा नाही. आणि 'आपला' विरुद्ध 'विरोधी' असे दोन पक्ष नसले आणि त्यातले कोण जिंकणार याची उत्सुकताच नसली तर मग तटस्थपणे हे सामने पहायला फारशी मजा येत नाही. शिवाय मॅचफिक्सिंगचे प्रकार सुरू झाल्याने त्या पहाण्यात स्वारस्य उरले नाही.

गेल्या दहा पंधरा वर्षात क्रिकेटचा अतिरेकच नव्हे तर अजीर्ण व्हायला लागले होते. पन्नास साठ वर्षांपूर्वी पॉली उम्रीगरसारख्या एकाद्या फलंदाजाने आयुष्यभरात दोन हजार धावा काढल्या तर तो मोठा विक्रम समजला जायचा, आता एकेका वर्षांत हजारावर धावा काढणेही सामान्य होऊन गेले आहे, कारण हे लोक बाराही महिने खेळतच असतात आणि पाच दिवसाच्या कसोटी सामन्यात काढाव्यात तशा भरपूर धावा हे एक दिवसाच्या सामन्यातसुद्धा दणादण काढत राहतात. अतिपरिचयात अवज्ञा या नियमाप्रमाणे मी आजकाल त्या सामन्यांची दखल घेणे सोडूनच दिले होते. कोविडमुळे मध्ये बराच काळ खंड पडल्यानंतर आता पुन्हा त्यात थोडा रस घ्यायला सुरुवात केली आणि बऱ्याच काळानंतर एक कसोटी सामना पाहिला.

. . . . . 

ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या जात असलेल्या या मालिकेतला पहिला सामना पाहिल्यानंतर मी हा लेख लिहिला होता. त्या सामन्यात भारतीय संघ चारी मुंड्या चीत झाला असला तरी तो पुन्हा आपले डोके वर काढेल अशीआशा मी बाळगली होती. त्याप्रमाणे दुसऱ्याच सामन्यात नवा कप्तान झालेल्या अजिंक्य रहाणे याने दमदार फलंदाजी करून शतक झळकावले, इतर फलंदाजांनी त्याला साथ दिली आणि गोलंदाजांनीही ऑस्ट्रेलियाच्या संघाला दोनदा बाद करून भारताला विजय मिळवून दिला आणि साखळीत बरोबरी गाठली.

 तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर रचला होता आणि भारताची सुरुवातही बरी झाली नव्हती, पण नंतर आलेल्या खेळाडूंनी घसरगुंडी होऊ न देता जरा सन्माननीय अशी धावसंख्या काढली तरी ती ऑस्ट्रेलियाच्या मानाने खूप कमीच होती. मग ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात आणखी धावा काढून त्यांचा डाव घोषित केला. आपले गोलंदाज त्यांच्या पूर्ण संघाला बाद करू शकले नाहीत. अशा प्रकारे हा सामना ऑस्ट्रेलियाच्या मुठीतच होता. भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही फारशी बरी झाली नाहीच. हा सामना जिंकण्याची सुतराम शक्यता नव्हती, शक्य तितका वेळ मैदानावर टिकून राहणे एवढ्याच उद्देशाने खेळणे चालले होते, तरीही सर्व मुख्य फलंदाज बाद होऊन गोलंदाज शिल्लक उरले होते आणि त्यांना गुंडाळायला ऑस्ट्रेलियाच्या तोफखान्याला फार वेळ लागणार नाही अशी लक्षणे दिसत होती. त्यावेळी क्रीजवर असलेला हनुमाविहारी याला मुद्दाम कसोटी सामन्यासाठी पाठवले असले तरी तो आतापर्यंत फेल गेला होता आणि या सामन्यातही जायबंदी झाला होता.  तो लंगडत लंगडत कसाबसा चालत होता. त्याच्या जोडीला असलेला अश्विन हा खरे तर गोलंदाज म्हणून संघात आलेला पण फलंदाजीत प्रवीण झालेला होता.  ऑस्ट्रेलियाच्या जलदगति गोलंदाजांनी तुफान भेदक मारा चालवला होता, त्यांचे उसळते चेंडू फलंदाजांची अंगे सुजवून काढत होते. तरीही या दोघांनी कमालीच्या धैर्याने आणि जिद्दीने तो मार सहन करत डोके शांत ठेऊन दीड दोन तास खिंड लढवली आणि ते अखेरपर्यंत नाबाद राहिले. हा सामना अनिर्णित राहिलेला पाहूनच केवढा आनंद झाला. पन्नास साठ वर्षांपूर्वीच्या काळाची आठवण झाली.

चौथा कसोटी सामना सुरू झाला तेंव्हा संघातले चारपाच खेळाडू जखमी होते. बूमरा आणि शमी हे आपले दोन्ही आघाडीचे जलदगति गोलंदाज खेळू शकणार नव्हते, तसेच तिसऱ्या सामन्यातला हीरो विहारीही नव्हता. मुख्य फलंदाज कप्तान विराट कोहली तर आधीच भारतात परत आला होता, आघाडीचा फलंदाज धवनही नव्हता. त्यामुळे राखीव म्हणून नेलेल्या तरुण होतकरू खेळाडूंना घेऊन आपला संघ मैदानावर उतरला होता. या संघाकडून कुणीही फार अपेक्षा ठेवल्याच नव्हत्या. अजून जास्त लाज न घालवता हा दौरा कसाबसा पूर्ण करायला हवा म्हणून ते बचावाचा खेळ खेळतील असे वाटले होते आणि खेळाची सुरुवातही तशीच झाली. पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या संघाने धावांचा डोंगर उभा केला. आपल्या आघाडीच्या फलंदाजांनी हळू हळू धावा जमवत फॉलो ऑनची नामुष्की टाळली तेंव्हा पहिला सुस्कारा सोडला. तरी तोवर अर्धा संघ गारद झाला होताच. पण त्यानंतर आलेल्या शार्दूल ठाकूर आणि सुंदर यासारख्या नवख्या खेळाडूंनी भलत्याच चिकाटीने खेळून तीनशेचा टप्पा पार केला आणि पहिल्या डावातील धावसंख्यांमधला फरक अगदी मामूली ठेवला. तरीही ऑस्ट्रेलियाच पुढे राहिली होती आणि चांगल्या परिस्थितीत होती. दुसऱ्या डावात मात्र आपल्या नव्या गोलंदाजांनी जीव ओतून गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या खेळाला आळा घातला आणि त्यांचे सर्व खेळाडू बाद केले. आताही सामना जिंकण्यासाठी भारताला दुसऱ्या डावात तीनशेवर धावा करण्याचे मोठे आव्हान होते. यापूर्वीच्या सामन्यांमध्ये भारताने तेवढी मजल मारली नव्हती. ब्रिस्बेनचे हे मैदान ऑस्ट्रेलियाला नेहमी यशस्वी करत आले होते आणि तिथे त्यांचाच विजय अपेक्षित होता.  त्यात आपला भरोशाचा रोहित शर्मा लवकर बाद झाला. पण त्यानंतर आलेल्या पुजाराने कमालीचा बचाव केला. तो स्टंप्सवर येणारे सगळे चेंडू फक्त अडवत आणि न येणारे चेंडू सोडून देत राहिला, फटके मारून रन्स काढण्याचा प्रयत्नच करत नव्हता. दुसऱ्या बाजूने शुभमन गिल बऱ्यापैकी चांगला खेळून स्कोअर वाढवत होता, पण नव्वदीत आल्यावर तो बाद झाला. नंतर आलेल्या फलंदाजांनीही संथ धोरणच चालू ठेवले होते. तिसऱ्या कसोटीप्रमाणेच हा सामनाही अनिर्णित ठेवण्यात यश मिळेल असा विश्वास वाटयला लागला होता. 

महेंद्रसिंग धोनी निवृत्त झाल्यानंतर त्याच्या जागी यष्टीरक्षक म्हणून संघात आलेला ऋषभ पंत खेळायला आला आणि त्याने धुवाँधार फलंदाजी करून सगळे चित्र बदलून टाकले. वीस षटकांच्या सामन्यातले फटके मारून चौकार षटकांची आतिशबाजी सुरू केली. विजय नजरेच्या टप्प्यात आल्यानंतर तो मिळवण्यासाठी सुरू केलेल्या घाईत समोरचे दोन तीन फलंदाज बाद झाले, तरी ऋषभने वेळ संपायच्या आत आवश्यक तेवढ्या दावा काढून विजयश्री खेचून आणली तेंव्हा सगळे हक्केबक्के होऊन गेले. सामन्याच्या अगदी शेवटच्या तासात मिळालेल्या या अनपेक्षित विजयामुळे भारतीय क्रिकेटच्या क्षेत्रात नवा इतिहास घडला असे म्हणता येईल. या निमित्याने पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमी लोकांचे लक्ष कसोटी सामन्यांकडे वळले.       

 

No comments: