Saturday, October 01, 2011

संध्या छाया

सन १९७५ - आम्ही माझ्या एका ज्येष्ठ आप्तांकडे आग्र्याला गेलो होतो, त्यांचे नाव डॉ.कुंटे. पूर्वी राजाकी मंडी या भागात त्यांचा दवाखाना होता आणि त्याच भागात ते रहात असत. एक निष्णात डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होतीच, शिवाय समाजकार्य आणि देशसेवा यातही त्यांचा महत्वाचा सहभाग असल्यामुळे त्या भागातील आबालवृध्द त्यांना ओळखत होते. पुढे त्यांचा मुलगा राजा डॉक्टर बनला आणि हळूहळू त्याचा जम बसत गेला. त्यांच्या दवाखान्याखेरीज इतर काही नर्सिंग होम्स, हॉस्पिटल्स वगैरेंमध्ये तो जात असे. राजाकीमंडीमधील जुने घर सोडून ते कुटुंब आग्रा शहराच्या बाहेर दयालबाग रोडवरील नव्या बंगल्यात रहायला आले. सीनीयर डॉक्टरसाहेबांना तिथून रोज त्यांच्या जुन्या दवाखान्यात जाणेयेणे कठीण होते. आम्ही त्यांच्याकडे गेलो तोपर्यंत त्यांनी प्रॅक्टिस करणे थांबवले होते. सकाळच्या वेळी त्यांच्या बंगल्यासमोरील अंगणात कोवळे ऊन खात आम्ही गप्पा मारत बसलो होतो. बंगल्याच्या गेटमधूनच एका माणसाने आरोळी ठोकली, "डॉक्टरसाब".
डॉ.कुंटे लगबगीने धावतच पुढे गेले. त्या माणसाला विचारले, "क्या हो गया? किसे तकलीफ है?"
त्याने विचारले, "डॉक्टरसाब घरमे है? उनसे अर्जंट काम है।"
डॉ.कुंटे त्याच्याकडे पहातच उभे राहिले. दोन तीन सेकंदांनंतर त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि त्यांनी मुलाला हाक मारली, "राजा, बाहेर तुझ्याकडे कोण आले आहे बघ रे !"
माझ्याकडे पहात पण विषण्णपणे स्वतःशीच पुटपुटले, "ढळला रे ढळला दिन सखया". संध्याछायांची होणारी ही जाणीव नक्कीच हेलावणारी होती.

सन १९९० चा सुमार - माझे दुसरे एक जवळचे आप्त वयाच्या सत्तरीकडे झुकले होते. वयोमानानुसार काही दुखणी मागे लागली असली तरी ते तसे टुणटुणीत होते. त्यांच्याहून वयाने दोन चार वर्षांनी मोठी किंवा लहान असलेली गावातली ज्येष्ठ मंडळी एक एक करून हळू हळू कमी होत होती. त्या सर्वांनी त्या लहान गावात उभा जन्म घालवलेला असल्यामुळे अर्थातच ती सगळी मंडळी जवळ जवळ रोज भेटत असत, करण्यासारखा दुसरा कोणता उद्योगच नसल्यामुळे रिकामा वेळ घालवण्यासाठी ते नेहमी एकमेकांकडे जात येत असत. त्यामुळे अचानक त्यातल्या एकाद्याला वरून बोलावणे आले तर बाकीच्यांना असह्य धक्का बसत असे. आम्ही त्यांच्या घरी गेलेलो असतांना गावात अशीच एक घटना घडली होती. समाचाराला आलेली मंडळी बोलत होती, "अप्पांचं तसं सगळं झालं होतं, मुलं मार्गाला लागली होती, मुली सासरी नांदत होत्या, नातवंडांचं सुखही त्यांनी पाहिलं होतं, आता कुठली जबाबदारी त्यांच्यावर नव्हती .... वगैरे वगैरे". घरात आणि शेजारीपाजारी होत असलेल्या चर्चांमध्ये याचेच प्रतिध्वनी कानावर येत होते.

ते ऐकतांना माझ्या आप्ताच्या चेह-यावरले भाव मी पाहिले आणि मनात एकदम चर्र झाले. त्यांची पत्नी पूर्वीच अकाली स्वर्गवासी झाली असल्यामुळे ते एकटे झाले होते. त्यांच्याही मुलींची लग्ने होऊन त्या आपापल्या सासरी गेल्या होत्या, मुलाचे लग्ने होऊन सून घरी आली होती. आता घरातला आणि व्यवसायातला सर्व कारभार त्यांनी हातात घेतला होता. सर्व मुलामुलींनी 'हम दो हमारे दो' चा कोटा पूर्ण केलेला होता आणि ते आपापल्या चौकोनात सुखात होते, तसेच आपापल्या वाटांनी प्रगतीच्या मार्गावर चालत होते. त्यामुळे माझ्या या ज्येष्ठ आप्तांना आता आपली जगाचा निरोप घ्यायची वेळ आली आहे की काय असे मनातून वाटले असावे. त्यांनी तसे बोलून दाखवले नसले तरी मला त्यांच्या चेहे-यावर ते दिसले असे निदान मनातून वाटले. पण माझ्याहून वयाने वीस वर्षांहून मोठ्या असलेल्याला मी कसले काउन्सलिंग करणार असा विचार करून मी काही बोललो नाही. पण त्यांची इच्छाशक्ती नक्कीच कमकुवत झालेली असावी. त्यानंतर काही महिन्यांमध्येच त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.

जयवंत दळवी यांच्या संध्याछाया या नाटकाने अमाप लोकप्रियता मिळवली होती, तसेच अनेकांना अंतर्मुख केले असेल. ते नाटक आले त्या काळात मी वयाच्या माध्यान्हावरून किंचित पुढे सरकत होतो. आपल्या भविष्यकाळाची चाहूल लावणारे आणि त्याबद्दल अनिश्चिततेची शंका मनात उठवणारे हे नाटक होते. कदाचित त्यामुळे ते जास्तच प्रभावशाली वाटले, आतपर्यंत चटके लावत गेले. त्यानंतर 'तू तिथे मी', 'अवतार', 'बागबान' वगैरेसारख्या चित्रपटांची लाट येऊन गेली. "आमची मुले तशातली नाहीत हो" असे सांगायला ठीक असले तरी आत कुठे तरी थोडा हादरा बसल्याशिवाय रहात नव्हता.

ते सहन करत करत आणखी वर्षे गेली. लहान गावातल्या काळ्या मातीत रुजलेली मुळे आम्ही आपल्या हाताने कधीच नष्ट करून टाकली होती. मुंबईच्या सिमेंट काँक्रीटच्या घरातल्या चिनी मातीच्या बरणीत लावलेल्या मनीप्लँटसारखे आमचे जीवन होते. वरवर कितीही वाढतांना दिसली तरी ती सगळी वाढ दुस-यांच्या आधारावर ! त्या झाडांच्या जेमतेम बोटभर आकाराच्या मुळांमध्ये झाडाला आधार देण्याची शक्ती कुठे होती? नोकरीत असतांनासुध्दा परगावी बदली होण्याची टांगती तलवार डोक्यावर होतीच. बढती होऊन वरचा दर्जा मिळाला की पहिले निवासस्थान सोडून तिकडे जात होतो. म्हणजे पुन्हा नवी मुळे फुटावी लागत होती. अखेर सेवानिवृत्तीनंतर चंबूगबाळे आवरून तो परिसरच सोडावा लागणार हे माहीतच होते. ते ही करावे लागलेच. नव्या जागेत नवे आधार शोधले.

पण म्हणून काय झाले? आता संध्या छाया दिसायला लागल्या असल्या तरी त्यांना भ्यायचे काय कारण आहे? उन्हाची रणरण संपली आहे. या लांबत जाणा-या सावल्यांचा मजेदार खेळ निवांतपणे पहावा. आपल्याकडले ज्ञान आणि अनुभवांचे मधुघट कोणाला देऊन रिकामे होणारे नाहीत, उलट त्यात दिवसे दिवस आणखी काही थेंब जमा होत राहणार आहेत. मागचा आठवडा देण्याचे सुख (जॉय ऑफ गिव्हंग) चा होता म्हणे. तेच तर आता चालले आहे. आज ज्येष्ठ नागरिक दिवस आहे असे ऐकले. म्हणजे काय ते काही समजले नाही. पण या दिवशी माझ्या सहवयस्कांना मला एवढेच सांगावेसे वाटते की संध्याछायांना भिऊ नये. त्यांना धीटपणे सामोरे जावे, त्यांच्या बदलत जाणा-या आकारांची मजा लुटावी आणि देण्याचा आनंद घ्यावा.

No comments: