Thursday, January 21, 2010

ग्रहणे सुटली


डिसेंबरअखेर जो तो गेल्या वर्षाचा आढावा घेत असतो. त्या वर्षात घडून गेलेल्या कोणकोणत्या घटना लक्षात राहिल्या त्यांची आठवण काढतो. त्यातल्या कांही सुखद असतात तर कांही क्लेशकारक, कांही थक्क करणा-या असतात तर कांही दिग्मूढ, कांही उत्साहवर्धक असतात तर कांही चिंताजनक, कांही मजेदार असतात, तर कांही विचार करायला लावतात. त्या घटनांवरून पूर्वीचे अनुभव आठवतात. गेलेल्या वर्षात कांही गोष्टी मनासारख्या घडून येतात तर कांही तशा घडत नाहीत, आपण केलेल्या कांही योजना सफळ झालेल्या दिसतात, तर कांही गोष्टी मनात असल्या तरी जुळून येत नाहीत. अशा सगळ्यांचा ताळेबंद वर्षाच्या अखेरीस मनोमनी होत असतो.

नव्या वर्षाचे स्वागत आपण नव्या उमेदीने करतो. नव्या कल्पना, नवे विचार घेऊन नवे मनसुबे बांधतो. या ब्लॉगचा जन्मच मुळी नववर्षदिनाला झाला आणि याचे पुनरुज्जीवनही नव्या वर्षाच्या सुरुवातीला झाले. त्यामुळे नववर्षदिनाला इथे फार महत्व आहे. गेल्या वर्षाची सांगता आणि नव्या वर्षाची सुरुवात या काळात या ठिकाणी बरेच कांही लिहायचा विचार होता. त्यासाठी अनेक विषय समोर येत होते. गेल्या वर्षीच्या मराठी ब्लॉगविश्वात झालेल्या एका स्पर्धेमध्ये या ब्लॉगचा समावेश उल्लेखनीयांच्या यादीत झाला होता. त्यामुळे अंगातला उत्साह वाढला होता. वाचनसंख्येचा आंकडा पुढे सरकत होता तसेच पाठीराख्यांची संख्या दुप्पट झाली होती. त्यांना नवनव्या गोष्टी दाखवण्याची जबाबदारी अंगावर येऊन पडली होती. एकंदरीत पहाता बरेच कांही करायची इच्छा होती आणि आवश्यकतासुध्दा होती. पण.....

फावला वेळ घालवण्यासाठी गेल्या वर्षाच्या सुरुवातीलाच दोन अवांतर कामे घेतली होती. वर्षभर ती हळूहळू चालत होती आणि मोकळा वेळ त्यात मजेत जात होता. पण वर्षअखेरीला काय झाले कुणास ठाऊक, दोन्ही कामांना अचानक भलताच वेग आला आणि त्यांचा पसारा वाढता वाढता एकमेकांना भेदून त्यांनी माझा सगळाच वेळ व्यापून टाकला. त्या राहू आणि केतूंनी या ब्लॉगला लावलेले ग्रहण जवळ जवळ महिनाभर चालले. अजूनही त्यांच्या पडछाया पूर्णपणे बाजूला झाल्या नसल्या तरी आता ग्रहण सुटून पुन्हा मार्ग दिसायला लागला आहे. त्यामुळे आता भेटत राहू.

No comments: