Wednesday, July 15, 2015

शस्त्रक्रियेची पूर्वतयारी - १

गुडफ्रायडेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मला अपघात झाला त्या दिवशी काढलेल्या एक्सरेवरूनच माझ्या दोन्ही हातांना झालेल्या दुखापतींची कल्पना डॉक्टरांना आली होती आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणारच आहे हेसुद्धा त्यांनी मलाही लगेच सांगितले होते. पण कुणालाच त्याची घाई दिसत नव्हती. हृदय, फुफ्फुस, जठर, यकृत यायारख्या अवयवांची आपल्या शरीराला सारखी नितान्त गरज असते, पण दोन्ही हातांची घड़ी घालून आपण हवा तितका वेळ बसून राहिलो तरी शरीराचे नेहमीचे सर्व व्यवहार व्यवस्थितपणे चालत राहतात. माझ्या बाबतीत नेमके तसेच झाले. वॉर्डमध्ये दाखल करण्याच्या आधीच माझ्या दोन्ही हातांना करकचून गुंडाळून उरापाशी नेऊन ठेवलेले होते, त्यांची कसलीही हालचाल करणे मला शक्यच नव्हते. चोवीस तास माझी सेवा करण्यासाठी दोन प्रायव्हेट अटेंडंट्स नेमले होते, ते मला उठवून बसवत आणि काम झाले की पुन्हा झोपवत असत, मला खाऊपिऊ घालत आणि नैसर्गिक विधींसाठी जे काही आवश्यक असायचे ते सारे ते करत होते. उदय आणि शिल्पा अधून मधून माझ्या आणि अलकाच्या वॉर्डमध्ये येऊन आमच्याशी बोलत बसायचे, वॉर्डमधल्या तसेच ऑफीसांमधल्या डॉक्टरांबरोबर चर्चा करायचे आणि एकमेकांची माहिती आम्हा दोघाना येऊन सांगायचे. अर्थातच त्यांची यात खूपच धावपळ होत होती. शिवाय आमच्या काही आवश्यक वस्तू किंवा कागदपत्रे वगैरे आणून देण्यासाठी त्यांना वाशीला घरीही जाऊन यावे लागत होते.

आम्हाला अपघात झाला असल्याची बातमी कानोकानी पसरत गेली आणि शनिवारी दुपारी अनेक लोक आम्हाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले . "ये क्या हुवा? कैसे हुवा? कब हुवा ? क्यूँ हुवा ?" वगैरे प्रश्न प्रत्येकाच्या मनात किंवा ओंठांवर असले तरी मी त्यांना उत्तर देण्याच्या स्थितीत नव्हतो. उदयकडे बोट दाखवून "हे त्याला विचारा" अशी विनंती करत राहिलो. "पण हे फार वाईट झालं, असं व्हा़यला नको होतं यावरून पुढे अमक्याचं असं झालं आणि तमक्याचं तसं झालं" अशी चर्चा होऊन वातावरण जास्तच दुःखीकष्टी व्हा़यला लागल्यावर मीच बोलायला सुरुवात केली, "हे पहा, मला तुम्ही दिसत आहात, तुमचं बोलणं ऐकू येत आहे, मीही थोडं बोलू शकत आहे, श्वास घेत आहे, माझी नाड़ी चालत आहे, मी खाल्लेलं अन्न पचत आहे, तेंव्हा देवाच्या दयेनं जेवढं काही आज माझ्याकडे आहे ते खूप महत्वाचं आहे, माझ्या या जखमा ठीक होणार आहेत आणि हातांचे ऑपरेशन झाल्यावर तेदेखील बरे होणार आहेत, म्हणजे मी या अपघातात जे गमावले आहे ते मला परत मिळणार आहे. त्याला अवधी लागेल, तोपर्यंत मला खूप वेदना सहन कराव्या लागतील, त्यासाठी मला या वेळी तुम्हां सर्वांकडून  धैर्य आणि मनोबल हवे आहे." त्यानंतर त्यांच्या बोलण्याला सकारात्मक दिशा आली.
मी त्यांना सांगितले, "माझी शारीरिक दशा तुम्ही पहातच आहात, पण मी एक (केविलवाणे का होईना) स्मित माझ्या (फाटलेल्या) ओठांवर आणण्याचा प्रयत्न करत आहे.
प्रत्येक माणसाला सहानुभूति हवी असते, पण अनुकंपा नको असते, मदत हवीशी वाटते पण कींव केलेली आवडत नाही असा मनुष्य स्वभाव आहे. पण या दोन्हींमधल्या सीमारेखा पुसट असतात, त्या केंव्हा ओलांडल्या जातात हे कधीकधी समजत नाही.

माझ्या रक्ताचे नमूने तपासण्यांसाठी पाठवलेले होतेच, क्ष किरणांचे फोटोही काढून झालेले होते, ईसीजी काढून पाहिला यात दोन दिवस गेले. सोमवारच्या दिवशी माझी सोनोग्राफी करायचे ठरले. मला बाटलीभर पाणी घेऊन त्या विभागात पाठवले. तिथे वीसपंचवीस पेशंट आधीपासून येऊन बसलेले होते, त्यात बहुसंख्येने गरोदर स्त्रिया होत्या. काही तांत्रिक कारण किंवा तज्ज्ञांची कमतरता या कारणाने तिथले काम सावकाशीने चालले होते. यामुळे आधीच तंग झालेल्या त्या विभागातल्या वातावरणात मी एका व्हीलचेअरवर सुन्नपणे बसून वाट पहात होतो. माझा नंबर त्या मानाने लवकरच लागला. पण डॉक्टरांनी तपासणी सुरुवात करता करताच विचारले, "इनको क्यों यहाँ लाया है? कौन कहता है कि इनको कोई प्रॉब्लेम है?" ते ऐकून मला थोडे बरेही वाटले , पण मीच त्यांना उत्तर दिले, "मेरा अभी ऑपरेशन होनेवाला है और शायद ब्लड टेस्ट देखकर मुझे यहाँ भेजना जरूरी लगा होगा।" "ओके ओके" करत त्यांनी मूत्रपिंडांची तपासणी करून रिपोर्ट दिला.
तिकडून वॉर्डमध्ये परत येतो तेवढ्यात मला पुन्हा व्हीलचेअरवर बसवून अॅनेस्थेशिया विभागात पाठवले गेले. तिथल्या तज्ज्ञाकडून एका प्रकारचे फ़िटनेस सर्टिफिकेट आणायचे होते. त्या डॉक्टरांनी माझी कसून चौकशी केली. यापूर्वी मला कोणकोणते आजार होऊन गेले? सध्या कोणत्या व्याधी आहेत? त्यासाठी कोणकोणती औषधे चालू आहेत वगैरे. मोतीबिंदू सोडल्यास माझे कोणतेही ऑपरेशन झालेले नव्हतेच, कोणत्याही सर्जनच्या हातातल्या शस्त्राचा माझ्या शरीराला स्पर्श झाला नव्हता आणि यापूर्वी मी फक्त लोकल अॅनेस्थेशिया घेतला होता वगैरे सांगितले. त्या डॉक्टरांना माझा रक्तदाब पहायचा होता, पण दोन्ही हातांना बँडेज बांधलेले असल्याने ते करता येत नव्हते. ते मला त्यांच्या लॅबमध्ये घेऊन गेले. तिथे एक पायाला बांधायचे यंत्र होते, पण त्या बद्दल काही शंकाही होत्या. त्यांनी कसाबसा माझा रक्तदाब मोजला, तो ज़रा जास्तच निघाला. कदाचित सकाळपासून चाललेल्या धामधुमीमुळे आणि मनस्तापामुळेही तो वाढला असेल. मला ऑपरेशन साठी परवानगी मिळाली किंवा नाही तेसुद्धा तेंव्हा समजले नाही.

मला गुडफ्रा़डेच्या रात्री हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्यानंतर अनेक तपासण्या सुरू झाल्या होत्या. सोमवारी अल्ट्रासोनोग्राफी आणि अॅनेस्थेशिया विभागात मला व्हीलचेअरवर बसवून नेऊन आणले असले तरी तेवढ्या श्रमानेही थकवा आला होता. अजूनही काय काय बाकी आहे याचा विचार करत मी निपचित पडलो होतो. चोवीस तासाचे मूत्र जमवून त्याची तपासणी करण्यासाठी एक मोठा कॅन आणून कॉटच्या खाली ठेवलेला होता. रक्ततपासणीसाठी आणखी नमूने घेण्यासाठी एक डॉक्टर आला, पण काय करावे ते त्याला समजेना. माझे दोन्ही हात बँडेजमध्ये पाहून त्याने पायात चार पाच ठिकाणी सुया खुपसून पाहिल्या, त्यातल्या कुठूनही त्यालाही रक्त मिळाले नाहीच, माझे सर्वांग आधीच भयानक ठणकत होते त्यात आणखी थोड़ी भर पडली, पायाचा शिल्लक राहिलेला भागही आता दुखायला लागला. आलीया भोगासी मी सादर होत राहिलो.

सोमवारी ६ एप्रिलच्या दुपारी मी वॉर्डमध्ये तळमलत पडलो होतो तेंव्हा ऑॅर्थोपिडिक डेपार्टमेंटमध्ये माझ्या बाबतीत एक वेगळाच विचार चाललेला होता. अलकाचे काही रिपोर्ट आणण्यासााठी उदय वाशीला गेला होता आणि शिल्पा अलकाच्या सोबतीला बसली होती. तिला बोलवून असे सांगितले गेले की बीएआरसी हॉस्पिटलमधले ऑॅपरेशन थिएटर पुढील महिनाभरासाठी बुक्ड आहे, यामुले मला वाशी इथल्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये पाठवायचे ठरले आहे. या अचानक निर्णयाने गोंधळून जाऊन ती माझ्याकडे वॉर्डमध्ये आली. मी या हॉस्पिटलचा लौकिक ऐकला असल्याने मी तिकडे जाण्यासाठी तयार होतो, पण अणुशक्तीनगर आणि वाशी अशा दोन ठिकाणी आम्ही दोघे असलो तर दोन ठिकाणी लक्ष देण्यासाठी आमच्याकडचे मनुष्यबळ कमी पडत होते. मी स्वतःच अपंग झालेलो असल्यामुले काहीच करू शकत नव्हतो, मला तर हातात मोबाइल फोन धरणेसुद्धा अशक्य होते. त्यामुळे कुणाशी बोलणार आणि कुणाला बोलावणार? उदयशी चर्चा करून ठरवा़यला पाहिजे, यासाठी थोडा अवधी मागा़यला हवा वगैरे मी शिल्पाला सांगितले. थोड्या वेळाने उदय आला तो ऑॅर्थोपिडिक डॉक्टरला भेटूनच माझ्याकडे आला. मला आजच फोर्टिस हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचे ठरलेले आहे, तिथल्या सर्जनशी बोलणेही झालेले आहे वगैरे सांगून झाल्यावर आता आपण कसे तरी मॅनेज करू असे तो म्हणाला. बीएआरसी हॉस्पिटलमध्ये असलेले माझे सामान, मुख्यतः विशिष्ट औषधे खणातून काढून घेतली. मी कॅज्युअल्टीमध्ये येऊन दाखल झालो होतो तेंव्हा काढून ठेवलेले म्हणजे अपघात झाला तेंव्हा माझ्या अंगावर असलेले रक्ताने माखलेले कपडे नेमके या वेळी माझ्याकडे पाठवण्यात आले होते, त्यांना असह्य असा दुर्गंध येत होता. ते गाठोडे उलगडूनही न पाहता जसेच्या तसे डिस्पोज ऑफ करायला मी उदयला सांगितले, त्यानुसार तो ते गाठोडे कोणाच्या तरी स्वाधीन करून परत आला. अँब्युलन्स आल्याचे समजताच मी वॉर्डमधून निघालो, जाता जाता अलकाच्या वॉर्डमार्गे व्हीलचेअर वळवून मी तिला भेटलो. आम्ही दोघे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्यापासून तीन दिवस एकमेकांना पाहिलेही नव्हते आणि आता किती दिवसाचा विरह होणार आहे याची कल्पना नव्हती. पण मी सेंटिमेंटल न होता उभ्या उभ्या म्हणजे व्हीलचेअरवर बसल्या बसल्या तिचा निरोप घेतला आणि अँब्युलन्समध्ये जाऊन झोपलो, अणुशक्तीनगरच्या हॉस्पिटलमध्ये माझ्या दिमतीला असलेल्या अटेंडंट्सशी उदयने बोलून घेतले आणि त्यांनाही फोर्टिसमध्ये यायला सांगितले. त्यासाठी त्यांचा भत्ता वाढवून दिला. त्या वेळी माझ्यासोबत असलेला दिवसपाळीचा अटेंडंट आणि उदय यांच्या बरोबर मी वाशी इथल्या फोर्टिस हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टी सेक्शनमध्ये येऊन दाखल झालो तोंपर्यंत सहा एप्रिलची रात्र झाली होती.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments: