Sunday, August 24, 2008

श्रीकृष्णाची गीते - भाग १,२,३


१. संत सूरदासांच्या रचना

व्यासांच्या महाभारतातल्या श्रीकृष्णाला घराघरात पोचवण्याचे काम त्याच्या भक्तांनी लिहिलेल्या सुरस पदांनी केले. त्यात सूरदास आणि मीराबाई यांची नांवे सर्वात मुख्य आहेत. दोघेही निस्सीम कृष्णभक्त होते, पण त्यांच्या भक्तीचे मार्ग भिन्न होते. सूरदासांच्या पदांमध्ये बाळकृष्णाच्या लीलांचे कौतुक केले आहे. चोरून लोणी खातांना यशोदामाईने रंगेहाथ पकडल्यानंतरसुद्धा कृष्ण आपला कशा प्रकारे बचाव करतो, कोणकोणती कारणे सांगतो ते या सुप्रसिद्ध पदात पहा.
मैया मोरी मैं नहीं माखन खायो
ख्याल परै ये सखा सबै मिलि मेरैं मुख लपटायो॥
भोर भई गइयन के पाछे मधुबन मोहे पठायो
चार पहर बंसी बट भटक्यों साँझ परी घर आयो ।।
देखि तुही छींके पर भाजन ऊंचे धरि लटकायो।
हौं जु कहत नान्हें कर अपने मैं कैसें करि पायो॥
मुख दधि पोंछि बुद्धि इक कीन्हीं दोना पीठि दुरायो।
डारि सांटि मुसुकाइ जशोदा स्यामहिं कंठ लगायो॥
ये ले अपनी लकुटि कमरिया बहुत ही नाच नचायो
सूरदास तब हँसी जशोदा ले निधि कंठ लगायो ।।
बाल बिनोद मोद मन मोह्यो भक्ति प्राप दिखायो।
सूरदास जसुमति को यह सुख सिव बिरंचि नहिं पायो॥
"माझ्या मित्रांनी दुष्टपणाने बळजबरीने माझ्या तोंडाला लोणी फासले, मी तर पहाटेच गायी चारायला रानात गेलो होतो तो संध्याकाळी घरी परत आलो, तू लोणी इतक्या उंच शिंक्यावर टांगून ठेवले होतेस तिथे माझे इवलेसे हात कसे बरे पोचतील?" वगैरे कारणे देऊन झाल्यावर थोडेसे दही शिल्लक असलेला द्रोण कृष्णाने हळूच लपवून दिला. हे सगळे एकून यशोदेला हंसू आवरले नाही. तिने कृष्णाला मायेने जवळ घेतले. भगवान शंकर किंवा ब्रह्म्याला जे सुख मिळाले नाही ते यशोदेला प्राप्त झाले असे सूरदास म्हणतात.
सूरदासांनी कृष्णाच्या बालपणावर अनेक गीते लिहिली आहेत. त्यातील जसोदा हरि पालनैं झुलावै। हलरावै दुलरावै मल्हावै जोइ सोइ कछु गावै॥
मैया मोहि दाऊ बहुत खिझायौ।मोसौं कहत मोल कौ लीन्हौ, तू जसुमति कब जायौ।।
वगैरे कांही गीते आजही खूप लोकप्रिय आहेत.
सूरदासांनी लिहिलेली भजने तर खूपच गाजली आहेत. त्यातील कांही प्रसिद्ध भजने खाली दिली आहेत.
अब मै नाच्यूँ बहुत गोपाल।
कामक्रोधको पहिरी चोलना कंठ विषयकी माल।।
अखियाँ हरि दर्शन की प्यासी ।
देखो चाहत कमल नयन को, निस दिन रहत उदासी ॥
प्रभू मोरे अवगुण चित न धरो ।
समदरासी है नाम तिहारो चाहे तो पार करो ॥
राधे कृष्ण कहो मेरे प्यारे भजो मेरे प्यारे जपो मेरे प्यारे ॥
भजो गोविंद गोपाळ राधे कृष्ण कहो मेरे ॥
एका भजनात सूरदासांनी जगातील अनेक विसंगतींचे मार्मिक दर्शन घडवून आणले आहे. गोड्या पाण्याने भरभरून नद्या वाहत समुद्राला मिळतात पण समुद्राचे पाणी मात्र खारट, बगळ्याला पांढरे शुभ्र पंख आणि कोकिळा काळी, हरणाला सुंदर डोळे दिले आहेत पण तो रानावनात भटकत असतो, मूर्ख लोक राज्य करतात आणि पंडित भिकेला लागतात वगैरे दाखवून अखेरीस घनःश्यामाला भेटण्यासाठी आपण किती व्याकुळ झालेलो आहोत ते त्यांनी सांगितले आहे.
उधो करमनकी गति न्यारी ।
सब नदियाँ जल भरि भरि रहियाँ। सागर केहि बिध खारी।।
उज्ज्वल पंख दिये बगुलाको । कोयल केहि गुन कारी ।।
सुंदर नैन मृगाको दीन्हे । बन बन फिरत उजारी ।।
मूरख मूरख राजे कीन्हे । पंडित फिरत भिखारी ।।
सूर स्याम मिलनेकी आसा । छिन छिन बीतत भारी ।।
---------------------------------------------------------------

श्रीकृष्णाची गीते - भाग २  August 24, 2008
संत मीराबाईच्या रचना

मीराबाईची श्रीकृष्णभक्ती अगदी आगळ्या प्रकारची होती. ती सर्वस्वी फक्त कृष्णाचीच आहे अशी तिची गाढ श्रद्धा होती. त्याचेशिवाय आपले असे दुसरे कोणीसुद्धा नाही. आई, वडील, भाऊ, बहीण वगैरे कोणी आपले नाही. तिचे बालपणीचे लग्न करून दिलेले होते, पण तिने कृष्णाला सर्वार्पण केले होते. लग्नाच्या नव-याला ती आपला पती मानतच नव्हती. त्यामुळे त्याच्या निधनाचा शोकही तिने केला नाही. घरदार, लोकलाज सारे सोडून देऊन ती साधुसंतांच्या संगतीत राहू लागली. राजघराण्यात वाढलेल्या मीराबाईने गांवोगांव वणवण फिरत तिने स्वतःला पूर्णपणे कृष्णभक्तीलाच वाहून घेतले. डोक्यावर फक्त मोरपीस खोचणारा गिरधर गोपाल तिचा पति होता आणि तशाच साधेपणाने राहणे तिला पसंत होते. "बाला मैं बैरागण हूंगी। जिन भेषां म्हारो साहिब रीझे, सोही भेष धरूंगी।" असे मीराबाईने एका गीतात म्हंटले आहे. संपूर्ण चेहेरा झाकून टाकणारी भरजरी राजस्थानी चुनरी सोडून देऊन तिने साध्या कापडाचा पदर माथ्यावर घेतला आणि मोती मूँगे यासारख्या रत्नांचे हार गळ्यात घालण्याऐवजी फुलांची वनमाला धारण केली. अश्रूंचे सिंचन करून कृष्णप्रेमाची वेल लावली आणि तिची वाढ होऊन त्याला आनंदाचे फळ आले. दुधाच्या मंथनातून निघालेले लोणी इतरांना खाऊ दिले आणि स्वतः ताकावर समाधान मानले. भक्तांना पाहून ती राजी झाली, पण जगाची रीत पाहून तिला रडू आले. आता गिरधर गोपालच तिला तारून नेईल अशी तिची श्रद्धा होती. किती अप्रतिम काव्य या गीतात आहे?
मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई।।
जाके सिर मोर मुकुट मेरो पति सोई।
तात मात भ्रात बंधु आपनो न कोई।।
छांडि दई कुलकी कानि कहा करिहै कोई।
संतन ढिग बैठि बैठि लोकलाज खोई।।
चुनरी के किये टूक ओढ़ लीन्ही लोई।
मोती मूंगे उतार बनमाला पोई।।
अंसुवन जल सीचि सीचि प्रेम बेलि बोई।
अब तो बेल फैल गई आंणद फल होई।।
दूध की मथनियाँ बड़े प्रेम से बिलोई।
माखन जब काढ़ि लियो छाछ पिये कोई।।
भगति देखि राजी हुई जगत देखि रोई।
दासी मीरा लाल गिरधर तारो अब मोही।।

हीच भावना दुस-या एका गीतात आहे. तिच्या जगावेगळ्या वागण्यामुळे अस्वस्थ झालेल्या तिच्या सास-याने आपल्या अब्रूखातर विषाचा प्याला तिच्याकडे पाठवून दिला आणि तिने तो हंसत हंसत पिऊनही टाकला. पण "देव तारी त्याला कोण मारी" या म्हणीचा प्रत्यय आला.

पग घूँघरू बाँध मीरा नाची रे।
मैं तो मेरे नारायण की आपहि हो गई दासी रे।
लोग कहै मीरा भई बावरी न्यात कहै कुलनासी रे॥
विष का प्याला राणाजी भेज्या पीवत मीरा हाँसी रे।
'मीरा' के प्रभु गिरिधर नागर सहज मिले अविनासी रे॥

मीराबाईच्या एक एक रचना अनमोल मोत्यासारख्या आहेत. कधी ती मला आपल्याला नोकरीत ठेऊन घेण्याची विनंती कृष्णाला करते. "तुझ्या बागेत काम करतांना रोज तुझे दर्शन घेऊन तुझे गुण गाईन" असे म्हणते.
स्याम! मने चाकर राखो जी । गिरधारी लाला! चाकर राखो जी।
चाकर रहसूं बाग लगासूं नित उठ दरसण पासूं।
ब्रिंदाबन की कुंजगलिन में तेरी लीला गासूं।।
आपल्या विरहव्यथा तिने "हे री मैं तो प्रेम-दिवानी मेरो दरद न जाणै कोय। या गाण्यात अतिशय उत्कटपणे मांडल्या आहेत. तर कधी "पपैया रे पिवकी बाणि न बोल। सुणि पावेली बिरहणी रे थारी रालेली पांख मरोड़।।" असे पपीहाला सांगून "ही विरहिणी तुझे पंख पिरगाळून टाकेल" अशी धमकी त्याला देते. "पीहू पीहू पपीहो न बोल " या लोकप्रिय गाण्याची प्रेरणा कवीला याच पदावरून मिळाली असेल. "म्हारो प्रणाम बांकेबिहारीको।" असा नमस्कार घालून ती "प्रभुजी मैं अरज करुँ छूं म्हारो बेड़ो लगाज्यो पार।।" अशी विनंती करते. "बसो मोरे नैनन में नंदलाल। मोहनी मूरति सांवरि सूरति, नैणा बने बिसाल।" या मीराबाईच्या प्रार्थनेवरून तिला 'दरसदिवानी' म्हंटले गेले असेल.

मीराबाईची सारीच गीते दुःखी नाहीत.
बरसै बदरिया सावन की सावन की मनभावन की।
सावन में उमग्यो मेरो मनवा भनक सुनी हरि आवन की।
या गाण्यात तिला काळ्या मेघातून बरसणा-या श्रावणधारांमधून घननीळाची चाहूल लागते आणि तिचे मन उल्हसित होते. "माई री! मैं तो लियो गोविंदो मोल।" या गीतात तर ती "मी विकत घेतला श्याम" असे ठासून सांगते.
मीराबाईच्या गीतांमध्ये कमालीची भावपूर्ण शब्दरचना तर आहेच, ती अत्यंत तालबद्ध आहेत आणि त्यांतील शब्दांनादेखील नादमाधुर्य आहे. त्यामुळेच महान संगीतकारांनी त्यांना अप्रतिम चाली लावल्या आणि आघाडीच्या गायकांनी त्या रचना अजरामर करून ठेवल्या आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------

August 25, 2008
श्रीकृष्णाची गीते - भाग ३
लोकधारा

सूरदास आणि मीराबाई यांच्याही आधी बंगालमध्ये होऊन गेलेल्या जयदेवांनी 'गीतगोविंद' या संस्कृत काव्याची रचना केली. कृष्ण आणि राधा यांचे प्रेम हा या काव्याचा मध्यवर्ती विषय आहे. धार्मिक विषयावरील ग्रंथात क्वचितच आढळणारा नवरसांचा राजा शृंगाररस या काव्यात पहायला मिळतो. त्यांच्यानंतर त्याच भागात होऊन गेलेले चैतन्य महाप्रभू मीरेसारखेच कृष्णाचे निस्सीम भक्त होते आणि कृष्णाचे भजन करतांना तल्लीन होऊन नाचत असत. त्यांनी सुरू केलेल्या कृष्णभक्तीच्या परंपरेची छाप तिकडच्या लोकनृत्यांवरही पडलेली दिसते. ओडिसी तसेच मणिपुरी शैलीच्या नृत्यांमध्ये कृष्णाच्या जीवनावर आधारलेले प्रसंग बहुधा असतातच.

उत्तर प्रदेशातील ब्रजभूमी तर कृष्णाचे जन्मस्थान. त्याचे बालपण पण तिथेच गेले. सूरदासांनी आपल्या प्रतिभेने ते रंगवले आहेच, पण त्या भागात विकसित झालेल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या "आज कैसी ब्रजमे धूम मचायी", "बिरजमे धूम मचाये स्याम", "होरी खेलत नंदलाला बिरजमे", "सांवरे ऐजैहो जमुनाकिनारे मोरा गांव " आदि अनेक चीजांमध्ये कृष्णाचा उल्लेख येतो. राजस्थानमध्ये मीराबाईची भजने लोकप्रिय झालीच पण शेजारच्या गुजरातमध्येही कृष्णाची गाणी म्हणत गरबा, दांडिया रास वगैरेच्या प्रथा सुरू झाल्या. कर्नाटकातले 'बैलाटा' हे पारंपरिक नृत्यनाट्य आता 'यक्षगान' या नांवाने प्रसिद्ध झाले आहे.
यात श्रीकृष्ण, रुक्मिणी व सत्यभामा यांच्या प्रमुख भूमिका असलेले पारिजातक आख्यान रंगमंचावर सादर करतात. पुरंदरदासांचे 'कृष्णा नी बेगने बारो (कृष्णा तू लवकर ये ना)' हे भजन सुप्रसिद्ध आहे. कांही वेळा या भजनाच्या आधारावर भरतनाट्यम किंवा कुचिपुडी नृत्यसुद्धा केले जाते. अशा प्रकारे भारताच्या विविध भागात कृष्णाचे वर्णन करणारी किंवा त्याला उद्देशून म्हंटलेली पदे परंपरागत लोकसंगीतात प्रचलित झालेली आहेत.

महाराष्ट्रातसुद्धा संतवाङ्मयामध्ये कृष्णभक्तीला महत्वाचे स्थान आहे. "कान्होबा तुझी घोंगडी चांगली । आम्हांसि कां दिली वांगली रे ॥" असे ज्ञानेश्वर महाराज विचारतात. तर "वारियाने कुंडल हाले । डोळे मोडित राधा चाले ।।" असे वर्णन संत एकनाथ करतात. तुकाराम महाराज म्हणतात,

कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता । बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझा ।।
कृष्ण माझा गुरू, कृष्ण माझे तारू । उतरी पैलपारू भवनदीची ।।
कृष्ण माझे, मन कृष्ण माझे जन । सोईरा सज्जन कृष्ण माझा ।।
तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटो ना करावा परता जीवा ।।

मुख्यतः अभंग गाऊन भजन करतांना त्याबरोबर भारुडे, जोगवा, गवळणी वगैरे म्हणायची प्रथा आहे. त्यातला गौळण हा प्रकार देवळातून उचलून तमाशातसुद्धा आणला गेला. सुरुवातीला गण आळवून झाल्यावर गौळण सादर केली जाते आणि त्यानंतर वगाला सुरुवात होते. दह्यादुधाने भरलेली गाडगी मडकी डोक्यावर घेऊन गवळणींनी मथुरेच्या बाजाराला जायला निघायचे. कृष्णाने त्यांना वाटेत अडवायचे आणि त्यानंतर त्यांचे उडणारे खटके विनोदी पद्धतीने दाखवले जातात. शाहीरांच्या इतर रचनांमध्येसुद्धा कृष्ण हा विषय येतोच. "घनःश्यामसुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला । उठी लवकरि वनमाळी उदयाचली मित्र आला ।।" या 'अमर भूपाळी'सारखेच "सांगा मुकुंद कुणी हा पाहिला " हे गीतसुद्धा प्रसिद्ध आहे. लोककला आणि कृष्ण यांचे नाते इतके घट्ट जमले होते की मराठी भाषेत जी पहिली संगीत नाटके व्यावसायिक रंगभूमीवर आली आणि त्यांनी नाट्यकलेचे नवे युग सुरू केले त्यात 'स्वयंवर' आणि 'सौभद्र' ही नाटके ठळकपणे समोर येतात. आज शंभर वर्षे होऊन गेल्यानंतरसुद्धा त्यांचे प्रयोग करणे आणि पाहणे रसिकांना आवडते.
--------------------------------------------------------------------------------------------------

No comments: