Saturday, August 29, 2015

मानवी संबंध (पूर्वार्ध) -जुळणे आणि तुटणे

संबंध या शब्दाची व्याप्ती फार विस्तृत आहे. ते व्यक्तीव्यक्तींमधले असतात तसेच इतर सजीव प्राणी, निर्जीव वस्तू, घटना किंवा विचार, सिद्धांत वगैरे अॅब्स्ट्रॅक्ट गोष्टींशीसुद्धा असतात.  आपल्या परिचयातल्या काही व्यक्ती त्यांच्या घरात कुत्रा किंवा मांजर पाळतात, ग्रामीण भागात काही लोकांच्या गोठ्यात गायीम्हशी असतात. त्या मुक्या प्राण्यांशी या लोकांचे घट्ट संबंध जुळलेले असतात. आपण त्यांच्याकडे जात येत असलो तर ते प्राणी आपल्याला ओळखायला लागतात आणि आपल्यालाही त्यांच्याबद्दल काही वाटायला लागते. शिवाय ते लोक आपले आहेत असे जरी म्हंटले की त्यांच्याकडल्या प्राण्यांशीसुद्धा आपला अप्रत्यक्ष संबंध जुळतोच. आपले कपडे, पुस्तके, घर वगैरें निर्जीव पदार्थ आपल्याला जीव की प्राण वाटायला लागतात. आपल्या आयुष्यात घडलेल्या महत्वपूर्ण घटनांचा संबंध आपल्याशीच नव्हे तर आपल्या भूतकाल, वर्तमानकाळ किंवा भविष्यकाळाशीही असतो. आपले विचार, मते, इच्छा, आकांक्षा, आवडी निवडी वगैरेंचा आपल्याइतका इतर कोणाशीच निकटचा संबंध नसतो.

आपण आधी त्यातल्या मानवी संबंधांबद्दल विचार करू. बहुतेक वेळा हे संबंध आपोआप किंवा योगायोगाने जुळतात, काही लोक त्याला सुदैवाने किंवा दैवयोगाने असेही मानतात. मूल जन्माला येताच त्याचे आई वडील, भाऊबहिणी, आजोबा आजी, काका. मामा, मावशी, आत्या वगैरे सगळ्या नातेवाईकांशी नातेसंबंध ही जन्माला येतात. शाळाकॉलेजात जाताच शिक्षक, प्राध्यापक, सहविद्यार्थी वगैरेंशी संबंध निर्माण होतात, तसेच नोकरीला लागताच सहकाऱ्यांशी होतात. पति किंवा पत्नी यांच्याबरोबरचे लग्न ठरवून केले जात असले तरी त्या क्षणी सासुरवाडीकडच्या सगळ्या नातेवाईकांशीसुद्धा आपले संबंध आपोआप जुळतात. खरेदी विक्रीचा व्यवहार ठरवून केला गेला तरी त्यामधून ग्राहक आणि विक्रेता यांच्याकडल्या इतर लोकांशीही संबंध येत राहतो. अशा प्रकारे बहुतेक सगळे मानवी संबंध आपोआप जन्माला येतात, अगदी थोड्या लोकांच्या बाबतीत मात्र आपण मुद्दाम प्रयत्न करून तो जुळवून आणतो.

मानवी संबंध आपणहून जन्माला येत असले तरी ते संबंध टिकवून ठेवणे मात्र जवळजवळ पूर्णपणे संबंधित व्यक्तींच्या हातात असते. संबंध आलेल्या व्यक्तीशी आपण कसे वागतो, कसे बोलतो याचप्रमाणे तो कसा प्रतिसाद देतो यावर ते अवलंबून असते. यासाठी दोन व्यक्तींनी सतत एकमेकांच्या संपर्कात राहणे आवश्यक असते, निदान ते उपयुक्त तरी असतेच. संपर्क तुटला की संबंधांवर धूळ साचायला लागते आणि ते विस्मृतीत जायला लागतात. आपल्याला  रोजच्या जीवनात जी माणसे भेटतात त्यांच्याशी आपण कधी गरजेनुसार कामापुरते बोलतो किंवा कधी कधी अवांतर गप्पाही मारतो. बोलणे झाले नाही तरी एकादे स्मितहास्य करून किंवा हात हालवून जरी त्याचे अभिवादन केले तरी त्यामधून आपले संबंध टिकून रहायला मदत होते. शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायामुळे अनेक लोकांना घर, गाव किंवा देशसुद्धा सोडून दूर जावे लागते. माझ्या लहानपणी पोस्टाने पत्र पाठवणे एवढाच संपर्कात रहाण्याचा एकमेव मार्ग उपलब्ध होता. पत्र पोचून त्याचे उत्तर यायला कित्येक दिवस लागत असत. यामुळे अशा प्रकारचा संपर्क फक्त अगदी निकटच्या निवडक लोकांशी ठेवला जात असे. मी तिशीमध्ये आल्यानंतर माझ्याकडे टेलीफोन आला आणि मला निदान काही स्थानिक लोकांशी तरी केंव्हाही बोलणे शक्य झाले. क्रमाक्रमाने एसटीडी आणि आयएसडी यांची सोय झाली आणि जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या आपल्या आप्तांशी बोलणे शक्य झाले. सुरुवातीला या सोयी महाग असल्यामुळे त्यांचा उपयोग जरा जपूनच केला जात असे. आता त्याही आपल्या आवाक्यात आल्या आहेत.

इंटरनेट सुरू झाल्यानंतर ई मेलद्वारे संदेश पाठवणे सुलभ आणि फुकट झाले. टेलीफोनच्या सोयी झाल्यानंतर व्यक्तीगत पत्रव्यवहार जवळजवळ संपुष्टात आला होता. ई मेलमधून त्याला एका वेगळ्या रूपामध्ये नवजीवन मिळाले. हाताने पत्रे लिहिण्याऐवजी लोक त्यांना संगणकावर टाइप करायला लागले. ऑर्कुट, फेसबुक, गूगलप्लस वगैरेंमुळे त्याला आणखी उधाण आले आणि आता ट्विटर आणि व्हॉट्सअपवर तर लहान लहान संदेशांचे महापूर यायला लागले आहेत. या सर्वांमध्ये एक अशी सोय आहे की आपण एकच संदेश एकाच वेळी कित्येक लोकांना पाठवू शकतो आणि त्यांचे प्रतिसादसुद्धा एकाच वेळी सर्वांना मिळतात. हे सगळे अगदी क्षणार्धात होते. यामुळे संपर्क साधून आपापसातले संबंध टिकवून ठेवणे आता खूप सुलभ झाले आहे. आंतर्जालावरली किंवा या मायानगरीतली ही माणसे प्रत्यक्ष आयुष्यात कामाला येतात का? असा प्रश्न विचारला अनेक वेळा जातो. त्याचे उत्तर असे आहे की ही सगळीच माणसे खरोखरच आपल्या उपयोगी पडू शकत नसली तरी एकाद दुसरा तरी मदतीसाठी पुढे येतोच. मुख्य म्हणजे आपली अडचण त्याला लगेच समजते.  एरवीच्या शांततेच्या काळात या मंडळींशी गप्पा मारून किंवा चर्चा करून आपल्याला एक प्रकारचा मानसिक किंवा बौद्धिक आनंद मिळत असतो.  आज माझे सुमारे तीनचारशे अशा प्रकारचे जालमित्र आहेत. त्यांच्याशी निरनिराळ्या विषयांवर गप्पा मारता मारता किंवा फक्त त्यांनी टाकलेल्या पोस्ट वाचत व चित्रे पहात पहातसुद्धा सारा दिवस आरामात चालला जातो.

संबंध टिकवून ठेवणे आपल्या हातात असते आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ते तोडून टाकणे किंवा वाढू न देणे सुद्धा आपल्याच हातात असते आणि त्यासाठी विशेष काही करावेही लागत नाही. शिवाय आपल्याला ज्यांच्याशी संबंध ठेवायचे असतात तोच जर त्यासाठी उत्सुक नसेल तर मात्र आपण काही करूही शकत नाही. संबंध ठेवले गेले नाहीत तर ते आपल्या आप क्षीण होत होत नाहीसे होतात. काही वेळा काही अप्रिय घटना घडतात त्यामुळे ते तुटले जातात किंवा मुद्दाम तोडले जातात.  दुधाने तोंड पोळलेला माणूस ताकसुद्धा फुंकून पितो याप्रमाणे  वाईट अनुभव आलेले काही लोक कोणत्याही अनोळखी किंवा अविश्वसनीय व्यक्तींपासून  थोडे अंतर राखूनच राहतात. काही वेळा एका काळी जवळची वाटत असलेली  माणसेसुद्धा कोणत्याही कारणाने एकमेकांपासून दूर गेल्यामुळेच संपर्कात रहात नाहीत आणि त्यामुळे ती माणसे हळू हळू मनानेही दूर जातात. आत्मकेंद्रित वृत्तीची (इन्ट्रोव्हर्ट) काही माणसे तुसडी किंवा माणूसघाणीच असतात. त्यांचे कुणावाचून काहीसुद्धा अडत नाही याचीच त्यांना घमेंड असली तर त्यांचे कुणाशीही चांगले संबंध जुळतच नाहीत.

संपर्क जोडणे आणि वाढवणे हे गुण लहान मुलांमध्ये भरपूर जास्त प्रमाणात असतात.  ती पटकन कोणालाही आपलेसे करतात. पण त्याचप्रमाणे हे सहजपणे जुळलेले संबंध ती लगेच विसरूनसुद्धा जातात. जसजसे वय वाढत जाते, जगाचे अनुभव येत जातात, टक्केटोणपे खाल्ले जातात त्यानुसार माणसे याबद्दल विचार करायला लागतात. कोणाशी किती प्रमाणात जवळचे संबंध ठेवावे हे ठरवायला लागतात. त्या संबंधामधून होत असलेल्या आणि होऊ शकणाऱ्या नफ्यातोट्याचा विचार करायला लागतात.  अशा प्रकारचे संबंध किती विशुद्ध आहेत आणि त्यात किती आपमतलबीपणा आहे हे चांचपून पहातात. लहानपणी जुळलेले संबंध सहसा पूर्णपणे तुटत नाहीत. ती व्यक्ती चारपाच दशकांनंतर जरी भेटली तरी पूर्वीच्या आठवणी उसळून वर येतात. हे काही प्रमाणात मोठेपणी भेटलेल्या व्यक्तींसंबंधातसुद्धा घडत असते. पूर्वीच्या काळी जवळ आलेली एकादी व्यक्ती कित्येक वर्षांनंतर नुसती भेटली तरी आपल्याला केवढा आनंद होतो! आपण तिच्याशी पहिल्याच जवळकीने छान बोलतो, त्यानंतर आपण पुन्हा एकमेकांना निवांतपणे भेटू असे नेहमी बोलले जाते. पण क्वचितच ते अंमलात आणता येते. ज्या कारणांमुळे आपले संबंध कमजोर झालेले असतात ती कारणे शिल्लक असली तर ते नव्याने जुळलेले पूर्वीचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी मनापासून खूप प्रयत्न केले जात नाहीत. माझ्या नात्यातली किंवा मैत्रीतली अशी कित्येक माणसे आहेत जी मला अचानक एकाद्या समारंभात भेटतात, त्या वेळी ती अत्यंत आपुलकीने बोलतात, एकमेकांना पुन्हा सवडीने भेटत रहायच्या योजना आखतात आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या एकाद्या समारंभातच भेटतात आणि अशा प्रकारे पूर्वीच्या भेटींची पुनरावृत्ती होत रहाते.

या विषयावर लिहावे तितके थोडे आहे. जे दोन चार ठळक मुद्दे आठवले तसे लिहिले आहेत
. . . .  . . . . .  पुढील भाग : मानवी संबंध (उत्तरार्ध) - प्रेमबंध
http://anandghan.blogspot.com/2015/09/blog-post.html

Friday, August 07, 2015

शस्त्रक्रियेची पूर्वतयारी - भाग २

मी अँब्युलन्समध्ये जाऊन झोपलो त्या वेळी माझ्या डोक्याला झालेली जखम ठणकत असली तरी ते काम करत होते आणि अंगात अशक्तपणा आलेला असला तरी माझ्यात बोलायचे त्राण होते. मी उदयला विचारले, "सगळी कागदपत्रे घेतलीस ना रे?" हो म्हणत त्याने हातातला लिफ़ाफ़ा दाखवला. त्यात फक्त एक रेफ़रल लेटर होते, माझ्या दोन्ही हातांच्या अमक्या अमक्या हाडांचे ऑपरेशन आणि मॅनेजमेंट एवढेच त्यात लिहिलेले होते आणि इतर ठराविक छापील मजकूर होता, बीएआरसी हॉस्पिटलमध्ये याआधी केलेल्या तपासण्यांचे रिपोर्ट, तिथे दिलेली औषधे वगैरेंचे एकादे डोसियर मला अपेक्षित होते, ते नव्हते. एवढ्यात ड्रायव्हरने गाडी सुरू केली आणि आम्ही मार्गस्थ झालो. फोर्टिस हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी विचारले तर त्यांना काय सांगायचे हा माझ्या मनात उठलेला प्रश्न उदयला विचारायचे राहूनच गेले. त्यासाठी कदाचित उदयला आणखी एक फेरी मारावी लागली असती, पण त्याची गरज पडली नाही. माझ्या एक्सरे फिल्म आमच्याकडेच होत्या, तेवढ्यावरच काम भागले. जिथे आमचा अपघात झाला होता ती जागा वाशीकडे जात असतांना वाटेत आली . आता त्या भयानक घटनेचा मागमूसही तिथे राहिलेला नव्हता. त्यानंतर कित्येक हजार गाड्या त्या स्पॉटवरून गेल्या असतील. त्यातल्या लोकांना आमच्या वाट्याला आलेल्या भोगाची पुसटशी जाणीवही व्हायचे काही कारण नव्हते.

अँब्युलन्समधून उतरल्यावर मला फोर्टिस हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टी विभागात दाखल करण्यात आले. त्यासाठी असलेला एक सविस्तर फॉर्म उदयने भरल्यानंतर मला त्यावर सही करायची होती, पण ते शक्यच नव्हते, डावा अंगठाही बँडेजमध्ये बंद होता, मंग उजव्या हाताच्या अंगठ्याला शाई लावून ठसा उमटवला गेला. तिथल्या नर्सने मात्र स्पिरिट लावून ती शाई लगेच पुसून टाकली, बीएआरसी हॉस्पिटलमध्ये डाव्या अंगठ्याला लावलेला रंग पुसट होत निघायला आणखी चार पाच दिवस लागले. अॅडमिशनच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी उदय फोर्टिस हॉस्पिटलच्या अकाउंट्स आणि अॅडमिन डिपार्टमेंट्सकडे ये जा करत होता आणि कॅज्युअल्टीत डोकावून माझ्यावरही लक्ष ठेवत होता. त्या दिवंशी बहुधा ते काम पूर्ण झालेच नाही, त्यातले उरलेले शेपूट त्याने दुस-या दिवशी सकाळी आल्यावर पूर्ण केले. इकडे कॅजियुअल्टीतले डॉक्टर आणि नर्सेस मात्र त्यांच्या कामाला लागले होते. त्यांनी पुन्हा माझ्या सर्व शरीराची संपूर्ण तपासणी केली, हातांवरची बँडेजेससुद्धा उलगडून आणि प्लॅस्टर कापून काढून आतल्या हातांना तपासले. नुकताच एकादा अपघात होऊन आलेला मी एक नवा रुग्ण असावा अशा प्रकारे त्यांचे काम चालले होते.

थोड्याच वेलात डॉ.सिद्धार्थ यादव यांचे आगमन झाले. त्यांचे उंचेपुरे आणि भारदस्त व्यक्तीमत्व याचीच कोणावरही अनुकूल छाप पडत असणार. हे सर्जन आपले ऑपरेशन करणार आहेत हे पाहून त्या अवस्थेतही मला बरे वाटले. डॉक्टरसाहेबांनी आल्या आल्या भराबर सारी कागदपत्रे वाचून त्यांच्या सहाय्यकांच्या नोंदी पाहिल्या. माझे एक्सरे फोटो लक्षपूर्वक पाहून सांगितले की दोन्ही हातांमध्ये प्लेट्स घालाव्या लागतीलच. "आपण उद्या दुपारी ऑपरेशन करून घेऊ" असे त्यांनी सांगितले तेंव्हा तर मला आश्चर्याचा एक लहानसा धक्काच बसला. त्यापूर्वी करायच्या तपासण्यांची एक मोठी यादी त्यांनी सहाय्यकांना पटापट सांगितली. डॉक्टर निघण्याच्या तयारीत असतांनाच डॉक्टर असलेला माझा भाचा श्री तिथे येऊन पोचला. त्याने वैद्यकीय भाषेत काही चर्चा केली त्यावरून मला एवढेच समजले की उजव्या हाताचे जे हाड मोडलेले आहे त्याला हे लोक ह्यूमरस असे म्हणतात. माझे हे हाड़ इतक्या जोराने ठणकत होते की यातल्या ह्यूमरसपणाला (विनोदाला) मी दाद देऊ शकत नव्हतो.

डॉक्टर यादव यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी लगेच सुरू झाली. माझ्या शरीरातल्या रक्तातल्या अनेक घटकांची पुन्हा एकदा नव्याने तपासणी आणि मोजणी करायची होती. त्यासाठी लागणारे रक्त कुठून आणि कसे काढायचे हा प्रश्न होताच. उजवा हात स्लिंगमधून बाहेर काढून त्याच्या मनगटाच्या शेजारी दोन तीन ठिकाणी सुया खुपसून पाहिल्यावर एका जागी त्यांना रक्ताचा झरा  (व्हेन) सापडला. दोन तीन टेस्ट ट़्यूबमध्ये त्यातल्या रक्ताचे नमूने काढून घेतले गेले. रक्तदाब कसा तपासा़यचा हा दुसरा प्रश्न होताच. उजव्या पायाच्या घोट्याच्या आसपास थोडीशी मोकळी जागा मिळाली तिथे बीपी मीटरचा पट्टा गुंडाळून त्याची झाली तशी नोंद केली. त्या वेळी मला मूत्रविसर्जनाचा काही त्रास होत नसला तरी ऑपरेशन करण्यासाठी त्य जागी एक कॅथेटर जोडून ठेवणे गरजेचे होते. ते लावून त्याला प्लॅस्टिकच्या नळीने एक पिशवी जोढून आणि बांधून ठेवली. शरीरामध्ये इंजेक्शने देण्यासाठी उजव्या हाताच्या पंजावर एक आय व्हीसाठी सुई खुपसून ठेवली. माझे शरीर आता पूर्णपणे कॅज्युअल्टीमधील डॉक्टर्स व नर्सेस यांच्या ताब्यात होते. त्यावर जे जे काही चाललेले होते ते स्वस्थपणे पाहणे आणि त्यातून ज्या वेदना होतील त्या सोसणे एवढेच मी करू शकत होतो.

त्यानंतर फोर्टिस हॉस्पिटलच्या निरनिराळ्या विभागांमधून  माझी ट्रॉलीवरली वरात हिंडायला निघाली. एकापाठोपाठ एक आणखी काही तपासण्या करून घ्यायच्या होत्याच. सर्वात आधी आम्ही स्कॅनिंग सेक्शनमध्ये गेलो. स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी उपयोगात येतात तशा बोगी हर्थ फर्नेसेस मी अनेक ठिकाणी पाहिल्या होत्या, एक दोन वेळा इलेक्ट्रिक क्रिमेटोरियमही पाहिले होते, तिथल्या यंत्रांची आठवण मला त्या स्कॅनरला पाहून  झाली. माझ्या ट्रॉलीची उंची तिथल्या बोगीएवढी वाढवून समान केली. मग चार जणांनी चार कोप-यात धरून माझ्या अंगाखालील बेडशीटसकट मला उचलले आणि त्या बोगीवर ठेवले. कारखान्यांमध्ये असते तशी क्रेन वापरली नाही नशीब. मग मला कुशीवर वळवून हळूच माझ्या अंगाखालची बेडशीट काढून घेतली. ऑपरेटरला सोडून बाकी सारे जण त्या खोलीबाहेर गेले. गळ्यात शील्डिंगचे जाड आवरण अडकवून ऑपरेटर माझ्या जवळ आला. मी केंव्हा श्वास घ्यायचा, धरून ठेवायचा, सोडायचा, किती निस्तब्ध रहायचे वगैरे सूचना पटापटा सांगून तो पॅनेलपाशी गेला. मी होकारारार्थी मानसुद्धा हलवली नाही.  

त्याने त्या यंत्राचे बटन दाबताच माझी बोगी हलायला लागली आणि आधी झरकन पुढे सरकली. माझे मस्तक त्या यंत्राच्या कमानीत शिरल्यानंतर तिचा वेग मंदावला आणि ती अत्यंत सूक्ष्म गतीने पुढे मागे सरकायला लागली.  त्या कमानीच्या आत एक प्रचंड आकाराची रिंग होती. एक क्ष किरणाचा झोत त्या रिंगमध्ये गोल गोल फिरत सर्व बाजूंनी माझ्या मस्तकामधून आरपार जात होता आणि पलीकडच्या बाजूला असलेल्या सेन्सर्समध्ये त्याचे रेकॉर्डिंग होत होते. मी भीतीने पटकन माझे डोळे मिटून घेतले, पण तरीही ते तीव्र किरण माझ्या पापण्यांच्या आत जाऊन डोळ्यांच्याही आरपार थेट मेंदूमध्ये जाणार होतेच. पण तेवढ्या एक्स्पोजरमुळे त्या अवयवांना इजा होण्याची शक्यता फार कमी होती. माझे डोके अत्यंत हळूहळू  त्या यंत्राच्या पूर्णपणे आत जाऊन पुन्हा बाहेर आल्यावर त्यााचे घरघरणे थांबले आणि अशा प्रकारे माझा सीटी स्कॅन पूर्ण झाला. त्यानंतर माझ्या खांद्याचा थ्री डी स्कॅन करायचा होता. त्यासाठी मला पुन्हा एकदा त्या यंत्रामधून आतबाहेर केले गेले.

मेंदू आणि खांद्याचे स्कॅनिंग संपल्यानंतर माझ्या हृदयाचा टू डी इकोकार्डिओग्रॅम काढायचा होता. त्यासाठी वेगळ्या खोलीत नेण्यात आले.  तिथल्या डॉक्टरने एक सेन्सर माझ्या छातीवरून फिरवत फिरवत आत काय चालले आहे याची स्क्रीनवर पाहून तपासणी केली. यावेळी आतल्या रक्ताभिसरणाचे खळखळाटासारखे आवाज मलाही मोठमोठ्याने ऐकू येत होते.  आपल्या हृदयामध्ये आपले रक्त अशा प्रकारे उसळ्या घेत असते हे मी प्रथमच अनुभवले आणि सळसळते रक्त असे का म्हंटले जाते हे समजले.

अखेर एकदाचे मला माझ्या खोलीत नेण्यात आले तोंपर्यंत जेवणाची वेळ टळून गेली होती, पण माझ्यासाठी जेवण आणून ठेवलेले होते ते चार घास पोटात ढकलणे आवश्यक होते. दुस-या दिवशी ऑपरेशन असल्यामुळे कडकडीत उपासच घडणार होता. रात्री एक ब्रदर (मेल नर्स) येऊन मला सांगून गेला की दुसरे दिवशी सकाळी सातच्या आत मी थोडा नाश्ता करू शकतो आणि त्यानंतर अकरा वाजेपर्यंत फक्त द्रवरूप पदार्थ सेवन करू शकतो. अकरा वाजल्यानंतर मात्र पाण्याचा थेंबसुद्धा प्यायचा नव्हता. त्यानुसार पहाटेच मला उठवून साडेसहालाच काही खायला दिले गेले आणि त्यासोबत माझी औषधे दिली गेली. त्यानंतर मलाही काही खाण्यापिण्याची इच्छा नव्हतीच. शिवाय एकापाठोपाठ एकेक कामे चालली होती.  एक न्हावी येऊन सर्वांगावरचे केस भादरून गेला. त्यानंतर आलेल्या सुपरवायजरला त्यात काही न्यून दिसले म्हणून त्याने हजामाला पुन्हा पाचारण करून जास्त तुळतुळीत हजामत करवून घेतली. मला आयव्हीमधून देण्यात येत असलेल्या औषधांच्या बाटल्या तर एका पाठोपाठ एक कोणी ना कोणी सारखे येऊन बदलून जात होते. मध्येच एकादी परिचारिका येऊन नाडीचे ठोके, रक्तदाब, रक्तातल्या प्राणवायूचे प्रमाण, तापमान वगैरे मोजून जात होती.  माझ्याकडे खूपच लक्ष दिले जात होते.

आदले दिवशी केलेल्या रक्ताच्य तपासण्या, सीटी स्कॅन, थ्रीडी स्कॅन, टूडी एको वगैरेंचे रिपोर्ट्स येऊन त्या त्या विषयातल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी पाहून झाल्यावरच ऑपरेशनला अनुमती मिळणार होती. आमच्या हॉस्पिटलमध्ये यात निदान दोन तीन दिवस जातात, पण इथे सगळे  समांतर चालले होते. या सगळ्या गोष्टी समाधानकारक असणारच असे गृहीत धरून एकेक कामे उरकवली जात होती. ऑपरेशन तर दुपारी होणार होते. तोपर्यंत अंगात थोडी शक्ती शिल्लक रहावी अशा सूज्ञ विचार करून पावणेअकराच्या सुमाराला मीच माझ्या मुलाला एकादा ज्यूस मागवायला सांगितले. रूम सर्व्हिसने तो येणार असल्याची चिन्हे न दिसल्याने तो स्वतः खाली गेला आणि मोठ्या मिनतवारीने फ्रूटीचे एक पॅकेट घेऊन अकरा वाजायच्या आत वर आला आणि मीही तहान भूक लागलेली नसतांनाच ते प्राशन केले.  

ठरल्या वेळी म्हणजे सुमारे दीड पावणेदोन वाजता मला ऑपरेशन थिएटरकडे नेण्यात आले. पहिल्या दरवाजामधून आत गेल्यावर तिथल्या वेगळ्या गणवेशातल्या स्टाफने माझा ताबा घेतला.  माझ्या व्हीलचेअरला ढकलत असतांना एकाने सहज म्हणून विचारले,  "सकाळपासून काही खाल्ला प्याला नाहीत ना?"
 "अजीबात काही खाल्ले नाही" मी उत्तर देत देत माहिती सांगितली, "फक्त थोडासा फळांचा रस घेतला."
"काय?" असे म्हणत तो जागच्या जागीच थबकला.
"अहो आम्हाला काल असेच सांगितले होते." मी गयावया करत म्हंटले.
"द्रवरूप पदार्थ म्हणजे फक्त पाणी प्यायला परवानगी असते" त्याने नवीनच व्याख्या सांगितली. आता एवढ्या कारणाने माझे ऑपरेशन रद्द होणार की काय? मला चिंता लागली. पण त्या गणवेशधारकांच्या म्होरक्याने पुढे जायचा निर्णय घेतला आणि मला पुढच्या दालनात नेता नेताच एक इंजेक्शन दिले गेले. त्यानंतर काही सेकंदांमध्येच माझी शुद्ध पूर्णपणे हरपली.