Monday, August 18, 2008

विठ्ठला तू वेडा कुंभार - भाग ६


"तूच घडविसी तूच तोडिसी" हे कडवे या संदर्भात समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. आपल्य़ा व्यक्तीमत्वातला प्रत्येक पैलू आपल्या अंतर्यामी बसलेल्या त्या अदृष्य निर्मात्यानेच पाडलेला असतो. त्याचे श्रेय किंवा त्याचा दोष आजूबाजूच्या परिस्थितीली देण्याची पद्धत आहे, पण ते पूर्णपणे खरे नाही. एका कुटुंबातील मुले कष्टाळू आणि अभ्यासू निघाली आणि त्यांनी परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले तर "त्याच्या आईवडिलांनी त्यांना चांगले वळण लावले, कडक शिस्तीत वाढवले, भरपूर प्रोत्साहन दिले, म्हणून ती यशस्वी झाली." असे म्हणतात. ती तशी निघाली नाहीत तर "अती धांकामुळे ती मुले बिथरली, त्यांच्या मनाचा कोंडमारा झाला, त्यांच्या प्रतिभेला फुलायला वावच मिळाला नाही" किंवा या उलट "फाजील लाड झाल्यामुळे ती बिघडली, वाया गेली." वगैरे म्हणतात. आता वळण लावणे, शिस्तीत ठेवणे आणि धांक दाखवणे यामधील सीमारेषा नेमकी कुठे असते? प्रोत्साहन आणि लाड यातला फरक कोण सांगू शकेल? एकाच वातावरणात वाढलेली दोन मुले सुद्धा एका साच्यात घालून निघाल्यासारखी नेहमी वागतात कां? सद्वर्तनी मातापित्यांची मुले सद्गुणी निपजली तर आपण "शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी।" असे म्हणतो आणि तसे झाले नाही तर "सूर्यापोटी शनैश्वर जन्माला आला." असे म्हणतो. बदनाम कुटुंबातील मुले वाईट रीतीने वागली तर लगेच "खाण तशी माती" हा वाक्प्रचार आठवतो आणि याउलट त्यांनी चांगुलपणा दाखवला तर "चिखलातून कमळ उमलते, भांगेत तुळस उगवली." वगैरे दाखले देतो. एकाच
घरातील भावंडे वेगळी निघाली तर "हांताची पांच बोटे तरी कुठे सारखी असतात?" हे उदाहरण आहेच! कोणी चांगला गायक समृद्ध कुटुंबात जन्माला आला असेल तर, "त्याला काही खायची प्यायची ददात नव्हती, आपलं सगळं लक्ष आपल्या कलेकडे देणं शक्य होतं, म्हणून तो इथपर्यंत पोचला. नोकरीधंद्याच्या रगाड्याला जुंपला असता तर त्याला हे जमलं असतं कां?" असे विचारतात आणि दुसरा कोणी तितकाच चांगला कलाकार हलाखीच्या परिस्थितीमधून वर आला असेल तर, "त्याला आपल्या कलेकडे लक्ष देण्याखेरीज गत्यंतरच नव्हते, तो त्याच्या पोटाचा प्रश्न होता ना? कंटाळा करून त्याला चालणारच नव्हते." वगैरे मुक्ताफळे उधळली जातात. थोडक्यात सांगायचे झाल्यास सगळ्या प्रकारची उदाहरणे आपल्याला दिसतात आणि त्यातल्या प्रत्येकाचे स्पष्टीकरण मिळते.

याचा अर्थ माणसाच्या जडणघडणीत परिस्थितीचा कांही वाटा नसतो असा अजीबात घेता येणार नाही, कांही प्रमाणात तो असतोच. प्राप्त परिस्थितीमधूनच संधी उपलब्ध होतात किंवा अडथळे येतात. पण मिळालेल्या संधीचा उपयोग करून घेणे वा न घेणे आणि समोर आलेल्या अडथळ्यावर मात करण्याचा प्रयत्न करणे वा न करणे हे सर्वस्वी त्या व्यक्तीवर अवलंबून असते. त्याच्या अंतरात दडलेला 'वेडा कुंभार' जसा कौल देईल तशा प्रकाराने त्याची वाटचाल होते. कोठल्याही ठिकाणची व कोठल्याही वेळची परिस्थिती ही एका दृष्टीने कांही प्रमाणात अनुकूल असते तशीच दुस-या कांही बाबतीत प्रतिकूल असते. त्यावर होणा-या माणसांच्या प्रतिक्रिया मात्र एकमेकीच्या विरुद्ध असू शकतात. आपण काय करू शकत नाही, कशात किती अडचणी आहेत, किती त्रास आहेत याचे रडगाणे सतत गाण्याची कांही लोकांना आवडच असते. नेहमी ते अडचणी शोधण्याच्याच प्रयत्नात असलेले दिसतात. गंमत म्हणजे काम करण्यासाठी प्रतिकूल असलेली परिस्थिती या लोकांना गळा काढण्यासाठी मात्र खूप सोयीची ठरते. या उलट, प्राप्त परिस्थितीबद्दल तक्रार करीत बसणे हा वेळेचा निव्वळ अपव्यय आहे असे कांही लोकांना वाटते आणि असेल त्या परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो इकडे ते सगळे लक्ष देतात, त्या दृष्टीने कामाला लागतात आणि प्रगतीपथावर पुढे जातात. माणसामाणसातला हा फरक त्यांच्यातल्या 'त्या वेड्या कुंभारा'मुळे पडतो आणि गंमत म्हणजे प्रत्येकाला आपला 'तो' शहाणा आणि इतरांचा 'तो' वेडा
वाटतो.

सर्व विश्वाच्या कर्त्याकरवित्या परमेश्वराप्रमाणेच हा आपला आंतला 'वेडा कुंभार'देखील बराच लहरी आहे. काल त्याने ज्या गोष्टीचा ध्यास घेतलेला असतो ती मिळून गेल्यावर आज त्याला तिचे कांही महत्वच वाटत नाही, कदाचित उद्या तिचा कंटाळा किंवा तिटकारासुद्धा येईल. या उलट काल असह्य किंवा अशक्यप्राय वाटणारी कल्पना आज सुसह्य आणि सुलभ वाटू लागते, उद्या कदाचित ती आवडायलाही लागेल. याचे कारण आपल्या व्यक्तीमत्वात सतत बदल घडत असतो. हा वेडा कुंभार जुनी मडकी निकालात काढून त्यांच्या जागी नवनवीन मडकी बनवून रचत असतो. या घटांना तो प्रेमाने कुरवाळतो तेंव्हा आपल्याला धन्यता वाटते आणि एक चापट मारतो तेंव्हा मेल्याहून मेल्यासारखे होते. त्याच्या लीलेमुळे कधी दृष्टी असून दिसत नाही, कळते पण वळत नाही, समजते पण उमजत नाही अशी त-हा होते. असे कां होते? आपण असे अतर्क्यपणे कां वागतो याचे आपल्यालाच नंतर आश्चर्य वाटते. हा सगळा त्या वेड्या कुंभाराचा प्रताप असतो एवढेच म्हणता येईल.

एकादी उत्कृष्ट साहित्यकृती आपण पुनःपुन्हा वाचतो तेंव्हा आपल्या मनातील वेगवेगळ्या संवेदना जागृत होतात, वेगवेगळ्या आशयांच्या छटा त्यात दिसतात हे त्या कलाकृतीच्या महानतेचे लक्षण आहे. विठ्ठला, तू वेडा कुंभार हे गाणे ऐकतांना माझ्या मनात उठलेले तरंग आणि वेगवेगळ्या स्तरावरून पाहता मला दिसलेले आशय यांचे हे संकलन आहे. ग.दि.माडगूळकरांना या गीतामधून हेच किंवा एवढेच सांगायचे असेल असा माझा आग्रह नाही. त्यांनी लिहिलेल्या काव्यामधून मला जितका बोध झाला तो मांडण्याचा प्रयत्न मी या लेखात केला आहे.


. . . . . . . . . . . . . . . (समाप्त)

No comments: