Friday, November 30, 2012

तेथे कर माझे जुळती - ११ - श्री.सुधीर दामले


मी लहान असतांना मला काही म्हणजे काहीही, अगदी दिसेल ते सगळे काही वाचण्याचे विलक्षण वेड होते. जे पुस्तक माझ्या हातात पडेल त्यातले मला काहीही समजो वा न समजो, त्यावर घातलेल्या वर्तमानपत्राच्या कव्हरसकट त्यातले अक्षर न् अक्षर मी वाचून काढत असे. त्यात मुद्रक, प्रकाशक, संपादक वगैरेंची नावेसुध्दा वाचली जात. त्यातले 'नवीन किताबखाना' हे नाव मला जरा वेगळे वाटायचे. 'किताब' म्हणजे पुस्तक आणि 'खाना' म्हणजे जेवण एवढाच त्या शब्दांचा अर्थ शाळेत शिकलेल्या हिंदी भाषेच्या ज्ञानावरून कळला होता, उर्दूचा गंधही नव्हता. त्या वयात 'नवीन', 'पुस्तक' आणि 'जेवण' या तीन्ही गोष्टी मला अतीशय प्रिय असल्यामुळे त्या नावाचा एकत्र संदर्भ लागत नसला तरी ते नाव लक्षात राहिले होते. 'किताबखाना' या उर्दू शब्दातल्या 'खाना'चा खाण्याशी कसलाच संबंध नाही असे मला नंतर कळले, पण तोवर तो शब्द माझ्या स्मृतीमध्ये रुतून बसला होता.  

मी कॉलेजात शिकत असतांना 'मार्मिक' हे व्यंगचित्रांना वाहिलेले बहुधा पहिलेच आणि कदाचित अखेरचे प्रसिद्ध मराठी साप्ताहिक सुरू झाले आणि अल्पावधीत ते तुफान लोकप्रिय झाले. मराठी युवकांना तर पुढच्या आठवड्याचा अंक केंव्हा बाहेर पडतो आणि आपण तो वाचतो असे होत असे. विनोदी तसेच जळजळीत व्यंगचित्रे आणि खुसखुशीत तसेच खरमरीत लेखांनी भरलेल्या त्या साप्ताहिकाच्या शेवटच्या पृष्ठावर 'पिटातल्या शिट्ट्या' या सदराखाली तत्कालिन चित्रपट आणि नाटकांचे खुमासदार रसग्रहण केलेले असे. अंकामधील इतर मजकुराप्रमाणे या स्तंभातसुध्दा नर्मविनोद आणि परखड टीका यांचे बेमालूम मिश्रण असायचे. सिनेमा किंवा नाटक यांचा पार पंचनामा न करता किंवा त्यातला कथाविषय सांगून न टाकता त्याबद्दल कुतूहल कायम राखून हे मनोरंजक लेख लिहिलेले असत. माझी वैयक्तिक मते त्या स्तंभलेखकाच्या मताशी जुळत होती की त्याचे शेरे ताशेरे वाचून त्यानुसार माझी मते त्या वयात घडत होती ते मला आता नक्की सांगता येणार नाही, पण मला हे सदर खूप आवडत असे. मी आधीच पाहिलेल्या नाटक सिनेमाबद्दल झालेली माझी मते हे सदर वाचतांना अधोरेखित होत असत आणि हे सदर वाचल्यानंतर ते खेळ पाहतांना त्यातले बारकावे जास्त चांगले कळत असत. थोडक्यात सांगायचे झाल्यास एकादा कार्यक्रम बरा किंवा चांगला वाटला तर तो कशामुळे आणि तो टुकार वाटला तर कशामुळे हे मला थोडे समजायला लागले. 'शुध्दनिषाद' या टोपणनावाने हा स्तंभ लिहिणा-या समीक्षकाचे नाव सुधीर दामले असे होते असे समजले.

किताबखाना आणि सुधीर दामले यांच्यात परस्परांमध्ये काही संबंध असेल असा विचार माझ्या मनात येण्याचे कारण नव्हते आणि माझ्या व्यक्तीगत जीवनाशी त्या दोघांचा दूरान्वयानेही काही संबंध नव्हता. पण माझे लग्न झाल्यानंतर तो आला. पती आणि पत्नी यांचे सर्व नातलग लग्नानंतर एकमेकांचे इन-लॉज होतात, त्यामुळे माझ्या विवाहानंतर आमच्या नातेवाईकांची संख्याही एकदम दुप्पट झाली. माझ्या नव्याने झालेल्या नातेवाईकांमध्ये जयश्रीताई दामले यांचे नाव ठळक होते. पहिल्या भेटीतच चांगली छाप पाडण्यासारखे त्यांचे ठसठशीत व्यक्तीमत्व आहेच, शिवाय मनमिळाऊ स्वभावाने त्या इतरांना आपलेसे करतात. त्यांचे पती सुधीरराव दामले यांनाही सगळ्या आप्तेष्टांमध्ये मोठे मानाचे स्थान होते. हे जोडपे मुंबईमध्ये रहात होते हे आमच्या दृष्टीने खूपच महत्वाचे होते. नव्याने संसार थाटतांना अनेक अडचणी आणि शंका यांचे डोंगर समोर असतात. जुन्या पिढीमधल्या लोकांचे आणि आपले आचारविचार यात जनरेशन रॅप असते. यावेळी आपल्याच पिढीमधल्या आणि सुस्थितीमध्ये स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांचे मार्गदर्शन मोलाचे असते. त्यासाठी सुरुवातीच्या काळात आमचे पाय आपोआप त्यांच्या घराकडे वळत असत.

त्या काळात सर्वांकडे टेलीफोन नसायचे. मोबाईल फोनचा शोधच लागलेला नव्हता आणि मुंबईमध्ये घरी पोस्ट खात्याचा टेलीफोन मिळण्यासाठी दहा बारा वर्षे वाट पहावी लागायची. मी तर त्यासाठी अजून अर्जसुध्दा केला नव्हता. दामल्यांच्या घरी फोन असला तरी शेजारपाजारी कुणाकडे जाऊन त्यांना फोन करण्याची सोय आमच्याकडे नव्हती किंवा कोणाकडे भेटायला जाण्यापूर्वी त्यांना अगोदर सूचना देण्याची सवयही अजून लागली नव्हती. आपण आपले सरळ जाऊन धडकायचे, भेटले तर उत्तमच, नाही भेटले तर चौपाटीवर फिरून यायचे अशा विचाराने एक दिवस आम्ही गिरगावातल्या त्यांच्या घरी गेलो. मी त्यापूर्वी गिरगावातल्या जितक्या लोकांकडे गेलो होतो ते सगळे सुप्रसिध्द 'बटाट्याच्या चाळी'ची आठवण करून देणा-या जुनाट चाळींमध्ये रहात असत. त्यामुळे अख्खे गिरगाव म्हणजे 'चाळ नावाच्या वाचाळ वस्तीं'चा मोठा समूह असावा असा माझा ग्रह झाला होता. दामल्यांच्या घरापर्यंत पोचण्याआधी त्यांच्या इमारतीमधल्या काळोखात दडलेल्या जिन्याच्या पाय-या चढतांना माझा तो ग्रह जास्त दृढ झाला,

त्यांच्या घराच्या दरवाजातून आत प्रवेश करताच मात्र मी थोडासा भांबावलो. त्या काळात आम्ही रहात असलेल्या वन रूम किचनच्या मानाने तो प्रशस्त असा सेल्फ कंटेन्ड फ्लॅट होता. 'इंटिरियर डेकोरेशन' हा शब्द अजून माझ्या ओळखीचा झालेला नव्हता, पण त्यांच्या दिवाणखान्यातले फर्नीचर, त्याची मांडणी, जमीनीवर अंथरलेला गालिचा, खिडक्यांचे पडदे वगैरे सगळे मला कलापूर्ण आणि आकर्षक दिसत होते. जयश्रीताईंनी सुहास्यवदनाने आणि मनःपूर्वक आपुलकीने आमचे स्वागत केले. आम्हाला आमच्या अगांतुकपणाची जाणीव करून दिली नाही. त्या वेळी सुधीरही घरात होते. त्यांनीही आमचे औपचारिक स्वागत केले.

'पिटातल्या शिट्ट्या' वाचून सुधीर दामले यांची जी प्रतिमा माझ्या मनात तयार झाली होती त्यात ते खूप खेळकर, मिश्किल स्वभावाचे आणि बोलघेवडे असतील असे मला वाटत होते. शिवाय त्यांच्याकडे मनोरंजनाच्या विश्वातल्या बातम्या आणि घडामोडी वगैरेंचा खजीना होता. त्यांच्याशी गप्पा मारतांना आपल्याला खूप मजा येईल, काही 'अंदरकी बातें' कळतील अशी आशा मला वाटत होती. त्यांच्या स्वतःच्या वर्तुळात ते बरेचसे माझ्या कल्पनेतल्यासारखेच असतात असे मला नंतर कळले. पण बहुधा त्यांच्या 'इनर सर्कल'मध्ये कुणाही सोम्यागोम्याला सहजासहजी प्रवेश मिळत नसावा. आम्ही त्यांच्या घरी गेलो तेंव्हा परस्परांना नमस्कार वगैरे उपचार झाल्यानंतर जयश्रीताई अलकाला घरात बोलावून घेऊन गेल्या. तिकडे गेल्यावर माहेरच्या मंडळींबद्दल आणि पूर्वीच्या आठवणीवर त्यांच्या गप्पा रंगल्या. मी त्यातल्या कोणालाच ओळखतही नव्हतो त्यामुळे मला त्यात रस नव्हताच. मी हॉलमधल्या सोफ्यावर बसून राहिलो.

सुधीर थोडा वेळ कसलीशी कागदपत्रे वाचत बसले होते आणि कोणाकोणाशी टेलीफोनवर बोलत होते. त्यानंतर ते उठून बाहेर चालले गेले, कदाचित त्यांच्या दुकानावर किंवा आणखी कोठे गेले असतील. समोर बसलेल्या माझ्या अस्तित्वाची त्यांनी फारशी गंभीर दखल घेतली नाही असे मला जाणवले. मीसुध्दा त्या काळात वडीलधारी माणसांशी बोलायला थोडा बिचकत होतो, त्यामुळे मी ही आपले तोंड उघडले नाही. समोर पडलेल्या वर्तमानपत्रांची पारायणे करीत आणि खिडकीतून दिसणारी गिरगावरोडवरली रहदारी पहात राहिलो. त्यानंतर सुरुवातीला काही ना काही कारणाने किंवा निमित्याने आम्ही वरचेवर त्यांच्या घरी जात होतो. दर वेळी जयश्रीताई आमचा चांगला पाहुणचार करायच्या. सुधीर मात्र कधी घरी भेटत, कधी त्यांची भेटही होत नसे. ते जिथे रहात होते त्याच बिल्डिंगच्या तळमजल्यावर त्यांचे ऑफीस कम दुकान होते, कदाचित आतल्या बाजूला छपाईची यंत्रसामुग्रीसुध्दा असेल. 'नवीन किताबखाना'चा व्यवहार तेथून चालत असे. हेच त्यांचे मुख्य ऑफीस होते की ती एक ब्रँच होती हे मला समजले नाही. त्या गाळ्यावर 'एन के प्रिंटर्स' असा बोर्ड होता. कधीकधी सुधीरांचे मँनेजर आतल्या बाजूला बसलेले दिसत. त्यांच्या घरी जातांना किंवा परत जातांना मी बाहेरूनच हात हलवून त्यांना अभिवादन करत असे. पुढे माझे काम आणि प्रपंच यात मी गुंतून गेलो आणि हळूहळू अलकाला मुंबईतले रस्ते आणि बसेस, टॅक्सी वगैरेंची चांगली माहिती झाली. अलका एकटीच किंवा मुलांना घेऊन जयश्रीताईंना भेटून येऊ लागली. त्यानंतर तिच्याबरोबर माझे दामल्यांच्या घरी जाणे कमी कमी होत बंद झाले. सुधीर आमच्या घरी कधी आलेच तरी त्या भागात त्यांची इतर कामे असत आणि ती करतांना ते आमच्याकडे उभ्याउभ्याने भेटून जात असत. आमच्या दोघांच्या एकत्र बसून दिलखुलास अशा गप्पा कधी झाल्याच नाहीत.  

असे असले तरी त्यांचे नाव मात्र आमच्या घरातल्या बोलण्यामध्ये नेहमी निघायचे. त्यांनी मार्मिकमध्ये लिहिणे थांबवले की मी मार्मिक वाचणे बंद केले ते आता आठवत नाही, पण माझे 'पिटातल्या शिट्ट्या' वाचणे कधीच थांबले होते. तरीही इतर वर्तमानपत्रे, मासिके वगैरेंमध्ये त्यांचे लेख, फोटो किंवा उल्लेख अधून मधून नजरेला पडत असत. कधी ते कोणाची मुलाखत घेतांना किंवा कोणाला मुलाखत देतांना किंवा एकाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचे दूरदर्शनवर अचानक दर्शन घडत असे. 'नाट्यदर्पण' या नावाचे नावाप्रमाणेच मराठी नाट्यसृष्टीला वाहून घेतलेले एक सुरेख मासिक त्यांनी सुरू केले आणि काही काळ चालवले. त्याचा दिवाळी विशेषांक तर फारच वाचनीय असे. मुंबईतल्या दादर आणि गिरगाव या भागातच त्या काळी मराठी नाटकांचे प्रयोग होत असत. आम्ही तिथून खूप दूर रहात असल्यामुळे आम्हाला नाटक पहायला तिकडे जाणे कठीण होते आणि ते संपल्यानंतर मध्यरात्री परत घरी जाणे त्याहूनही कठीण होते. तरीही आम्ही नाट्यदर्पणचे अंक आवर्जून वाचत असू आणि सुटीच्या दिवशी जमतील तेवढी नाटके पहात असू.

त्या काळात फिल्मफेअर हे मॅगेझिन अतीशय लोकप्रिय होते आणि फिल्मफेअर अॅवॉर्ड्स म्हणजे ऑस्कर अॅवॉर्ड्सच्या तुल्यबळ अशी भारतातली बक्षिसे होती. त्यांचा वितरण समारंभसुध्दा मोठ्या झोकात साजरा केला जात असे. आजकाल दर वर्षी अशा प्रकारची पंधरावीस अॅवॉर्ड्स दिली जातात आणि त्यांचे संयोजन कुठल्या ना कुठल्या परदेशातल्या ठिकाणी अतीभव्य प्रमाणात केले जाते. दर शनिवारी किंवा रविवारी त्यातला निदान एकादा तरी समारंभ टेलीव्हिजनवर दाखवला जातो. त्यामुळे आता त्याचे खास महत्व वाटत नाही. पण तीस पस्तीस वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवरील कलाकारांचे कौतुक करण्याची कसली योजनाच नव्हती. त्या काळात सुधीर दामले यांनी नाट्यदर्पण मासिकातर्फे असे अॅवॉर्ड्स समारंभ साजरे करणे सुरू केले आणि त्यासाठी दरवर्षी एका नाट्यदर्पण रजनीचे संयोजन केले.

ही नाट्यदर्पण रजनी मात्र आम्ही न चुकवता पहात होतो. तिची तारीख समजली की कॅलेंडरवर ठळक खूण करून तो दिवस आणि रात्र फक्त या कार्यक्रमासाठी आधीपासून राखून ठेवत असू. हा कार्यक्रमसुध्दा अत्यंत प्रेक्षणीय आणि सुश्राव्य असायचा. रंगमंचावर तसेच तिच्या पार्श्वभूमीवर चोख काम विविध करणा-या रंगकर्मींना पारितोषिके देऊन त्यांचा यथोचित सन्मान त्यात केला जात असेच, शिवाय विविध प्रकारचे आणि नाविन्याने भरलेले अत्यंत अभिरुचीसंपन्न आणि मनोरंजक असे लहान लहान कार्यक्रमांचे तुकडे त्या पारितोषिक वितरण समारंभाच्या मागे पुढे सादर केले जात असत. स्व.पु.ल.देशपांडे किंवा हेमा मालिनी यासारखी त्यांच्या क्षेत्रातील सर्वोच्च स्तरावरली एकादी सुप्रसिध्द व्यक्ती दर वर्षी मुख्य अतिथी असायची. नाट्यक्षेत्रामधले सारे प्रमुख कलाकार या सोहळ्याला हजर रहायचे आणि त्यातल्या लहानशा मनोरंजक आयटममधले छोटेसे काम समरस होऊन करायचे. त्या रात्री पुण्यामुंबईतल्या कुठल्याही सभागृहात नाटकाचा कार्यक्रम होत नसे असे मी ऐकले होते. नाट्यदर्पणच्या कार्यक्रमाची व्याप्ती, त्यातले वैविध्य आणि रंजकता दर वर्षी वाढतच गेली. इतका वैशिष्ट्यपूर्ण असा कुठल्याही भाषेमधला दुसरा कोणताही कार्यक्रम पहाण्याची संधी मला पुढेसुद्धा कधीच मिळाली नाही असे मी ठामपणे सांगू शकेन.  

इतके सुरेख आयटम्स फक्त एका प्रयोगासाठी बसवणे आणि त्यांची रंगीत तालीम घेणे वगैरे कामे सुधीर कशी करवून घेत असतील हे तेच जाणोत. यात प्रसिध्दीच्या शिखरावर असलेले मुरब्बी कलाकार असायचे आणि उदयोन्मुख किंवा अगदी नवे कलाकारही असायचे. या सर्वांना एकत्र आणणे किती कठीण काम असेल? अर्थातच यासाठी मोठे टीमवर्क असणार यात शंका नाही, पण ते सुरळीतपणे जुळवून आणण्यासाठी असणारे केंद्रीय नियोजन दामले कुटुंबीयच करत असत. या महत्कार्याचे मंचावरील संचालन या क्षेत्रामधील सुप्रसिध्द अशा इतर व्यक्ती करत असल्या तरी त्यांच्याही मागले खरे मुख्य सूत्रधार सुधीर दामले हेच असायचे हे समजून येत असे. पण रंगमंचावरील त्यांचा प्रत्यक्ष वावर मात्र अगदी मोजून मापून असायचा. त्यांच्या भाषणात कधीही आत्मप्रौढी नसायची, किंवा ते इतरांनाही त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळू देत नसत. नाट्यसृष्टी आणि त्यातले कलाकार यांच्यासंबंधी त्यांच्या मनात असलेले प्रेम, आत्मीयता तसेच तळमळ ते व्यक्त करून दाखवत असत. नाट्यविश्वाकडून त्यांना मिळणारा प्रतिसादसुध्दा अचंभित करणारा होता. त्यातले झाडून सारे प्रथितयश रंगकर्मी व्यावसायिक रंगभूमीवरचे काम (आणि त्याबरोबर त्यातून होणारी प्राप्ती) सोडून एक रात्र त्या सोहळ्याला उपस्थित रहात हे कौतुक किंवा आश्चर्य करण्यासारखे असे. पहायला गेल्यास सुधीर दामले हे नट, निर्माता, दिग्दर्शक वगैरे कोणी नव्हते किंवा त्यांच्या मालकीची नाट्यगृहे नव्हती, तरीही त्यांच्या हातात एवढे सामर्थ्य कशामुळे असायचे हे कोडे मला अनेक वेळा पडत असे.

नाट्यदर्पण रजनी या वार्षिक सोहळ्याखेरीज ते इतर काही नाट्यमहोत्सवांचे आयोजन करीत असत. एकाच सभागृहात एकाद्या वीक एंडच्या दोन अडीच दिवसात एका पाठोपाठ एक अशी आठ दहा संपूर्ण नाटके पहाण्याची संधी त्यात रसिकांना मिळत असे. नाटकांची निवड करतांना काही सामाजिक, काही रहस्यमय, तर काही जुनी पौराणिक कथेवरील संगीत नाटके अशी व्हरायटी त्यात मिळत असे. आमच्यासारख्या भुकेल्या प्रेक्षकांना ही पर्वणी वाटत असे. नाट्यदर्पण रजनी आणि हे नाट्योत्सव या दोन्ही कार्यक्रमात त्यातील कलाकारांना अगदी जवळून पहाण्याची संधी आम्हाला मिळत असे. कधी बॅकस्टेजवर जाऊन त्यांना भेटायला किंवा त्यांच्या संगतीत चहापाणी, भोजन वगैरे करायलासुध्दा मिळाले. "अमक्या प्रसिद्ध नटीने आमच्या डब्यातल्या तिखटमिठाच्या पु-या मिटक्या मारत खाल्या किंवा तमक्या वयस्क नटाला मी एकदा हाताशी धरून थोडे अंतर चालवत नेले." असल्या बढाया मारायची सवय मला नसली तरी कधी कधी तसे घडत होते आणि त्या आठवणी आपसूकच मनात जपून ठेवल्या गेल्या.

सुधीर दामले अनेक वर्षे मुंबईला रहात असले तरी पुण्याला त्यांचा वडिलोपार्जित वाडा होता. मुंबई सोडून कायमचे तिकडे जाऊन रहायचा निर्णय त्यांनी घेतला. त्या वाड्याची पुनर्रचना करून तिथे मोठी इमारत बांधली. त्यातला तळमजला बँका आणि इतर व्यावसायिकांना देऊन वरील दोन मजल्यांवर मोठे हॉल आणि राहण्यासाठी फ्लॅट बांधले. सुदर्शन या नावाने प्रसिध्द झालेला हा रंगमंच पुण्यामधील हौशी कलाकारांसाठी एक अत्यंत महत्वाचे ठिकाण झाले. त्याना फक्त एक मंच मिळाला असे म्हणण्यापेक्षा त्यातून प्रायोगिक नाटकांची एक सांस्कृतिक चळवळ (मूव्हमेंट) उभी राहिली असे म्हंटल्यास वावगे होणार नाही.  सुधीररावांचे बंधू रवी आणि वहिनी शुभांगीताई यांच्या पुढाकारामधून हे घडत असले तरी त्यामागची प्रेरणा, मार्गदर्शन आणि पाठिंबा सुधीरांचाच असणार.

सुधीर दामले यांचा शष्ट्यब्दपूर्तीचा उत्सव त्यांनी पुण्यातल्या एका चांगल्या हॉटेलात साजरा केला होता. त्या कार्यक्रमाला आम्ही मुंबईहून तिथे गेलो होतो. त्यांना अभीष्टचिंतन करण्यासाठी नाट्यक्षेत्रामधले कित्येक दिग्गज या कार्यक्रमाला आले होते. त्या अविस्मरणीय अशा संध्याकाळी जमलेल्या पाहुण्यांसाठी सुग्रास भोजनाखेरीज संगीताचीही मेजवानी होती. त्यात शास्त्रीय संगीतही होते आणि चक्क बैठकीची लावणी ठेवली होती. (कदाचित अप्रत्यक्षपणे सुधीररावांना उद्देशून गायिलेल्या) "पिकल्या पानाचा देठ बाई हिरवा" या लावणीनंतर जो टाळ्यांचा कडकडाट झाला त्याने सभागृह दुमदुमून गेले. अशा प्रकारचा वेगळेपणा आणि रसिकता फक्त तेच दाखवू शकतील. अशा पध्दतीची आणि इतकी रंगलेली साठी शांत मी तरी कधी आणि कुठे पाहिली नाही. अशा कार्यक्रमासाठी लागणारा दिव्य स्पर्श फक्त सुधीरांच्याचकडे आहे.

मागील आठवड्यात सुधीर आणि जयश्री यांच्या विवाहाचा सुवर्णमहोत्सवी सोहळा साजरा करण्यात आला. हा घरगुती स्वरूपाचा कार्यक्रम त्यांच्याच सुदर्शन हॉलमध्ये ठेवला होता. अगदी जवळचे असेसुध्दा शंभरावर आप्तस्वकीय त्याला उपस्थित होते. त्यातले बहुतेक लोक ज्येष्ठ नागरिक असणार हे अपेक्षितच होते. वयोमानानुसार सुधीरांची हालचाल मंद झाली होती. पण सर्वांना उद्देशून केलेल्या छोट्याशा भाषणात त्यांनी आपले मनोगत म्हणजे मुख्यतः आभार प्रदर्शन मोजक्या शब्दात खणखणीत आवाजात व्यक्त केले. "या निमित्याने जमलेल्या आप्तेष्टांना एकमेकांना भेटण्याची आणि गप्पागोष्टी करण्याची संधी देण्यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे. त्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून हा औपचारिक भाग आम्हाला शक्य तितक्या लवकर आटोपायचा आहे." असे सांगून त्यांनी त्यांची स्तुती करण्याची भाषणे करण्याची संधी कोणालाही दिली नाही. एवढे होईपर्यंत पाहुण्यांना सूप देणे सुरू झालेले होते आणि वरील मजल्यावर स्नेहभोजन तयार असल्याची वर्दी दिली गेली. आलेल्या प्रत्येक पाहुण्याने आल्याआल्या त्यांची भेट घेऊन अभीष्टचिंतन केलेले होतेच. हळूहळू सारे लोक भोजनकक्षात गेले आणि ओळखीतल्या इतर पाहुण्यांबरोबर गुजगोष्टी करत रेंगाळत राहिले. या कार्यक्रमाला येतांना कोणीही भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ आणू नये असे आमंत्रणपत्रिकेत लिहिलेले होते आणि त्याचे पालन झाले होते. आयोजकांनी मात्र आलेल्या पाहुण्यांना परत जातांना आभारपत्र आणि नव्या वर्षाचे कॅलेंडर दिले.

सुधीररावांच्याबद्दल मनांत खूप आदरभावना होतीच, त्यात आणखी एक तुरा खोवला गेला.  
--------------------------------------------------------------------------------------------------
Facebook status on 18/8/2016

तीस चाळीस वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवरील कलाकारांचे कौतुक करण्याची कसली योजनाच नव्हती. त्या काळात सुधीर दामले यांनी नाट्यदर्पण मासिकातर्फे असे अॅवॉर्ड्स समारंभ साजरे करणे सुरू केले आणि त्यासाठी दरवर्षी एका भव्य नाट्यदर्पण रजनीचे संयोजन केले. ... इतका वैशिष्ट्यपूर्ण असा कुठल्याही भाषेमधला दुसरा कोणताही कार्यक्रम पहाण्याची संधी मला पुढेसुद्धा कधीच मिळाली नाही असे मी ठामपणे सांगू शकेन. ..... नाट्यदर्पण रजनी आणि हे नाट्योत्सव या दोन्ही कार्यक्रमात त्यातील कलाकारांना अगदी जवळून पहाण्याची संधी आम्हाला मिळाली ती फक्त श्री.सुधीर दामले यांच्यामुळेच.  

निवडक आनंदघन Wordpress link 


Wednesday, November 21, 2012

कॉमन मॅन, सायंटिस्ट, इंजिनियर आणि एक कोडे



काही दिवसापूर्वी मिसळपाव या संस्थळावर एक सोपे वाटणारे कोडे दिले गेले होते. ते असे होते, "वीस लिटरच्या एका टाकीला खाली तोटी आहे. पूर्ण भरलेल्या टाकीतून तोटी उघडल्यावर एका मिनिटात २ लिटर पाणी कमी झाले. सर्व टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल?"


सर्वसामान्य माणूस असा विचार करेल, "दोन लिटर पाणी निघायला १ मिनिट लागले, या गतीने वीस लिटर पाणी दहा मिनिटात बाहेर पडेल."

हे प्राथमिक शाळेतले साधे त्रैराशिक झाले, यात कोडे कसले आले? टाकीमधील पाण्याची पातळी जसजशी खाली जाईल तसतसा पाण्याचा वेग कमी कमी होत जातो हे आपल्याला दिसतेच, त्यामुळे हे उत्तर बरोबर असणार नाही.

तोटीमधून बाहेर पडणा-या पाण्याचा वेग टाकीमधील पाण्याच्या पातळीच्या उंचीच्या वर्गमूळाच्या समप्रमाणात असतो ( उंची चौपट असली तर वेग दुप्पट असेल) आणि टाकीमधील पाण्याच्या उंचीत दर क्षणाला होणारी घट (dh) त्या वेगाच्या समप्रमाणात असते (पाण्याचा वेग दुप्पट झाला तर पातळी दुप्पट वेगाने खाली येते). म्हणजेच ती उंचीच्या वर्गमूळाच्या समप्रमाणात असते. असे त्याचे शास्त्र आहे. जसजशी पाण्याची पातळी खाली जाऊन उंची कमी होत जाईल तसतसा तोटीमधून बाहेर निघणा-या पाण्याचा वेगसुध्दा कमी होत जाईल. जेंव्हा त्याची उंची शून्याच्या जवळ जाईल तेंव्हा त्याचा टाकीच्या बाहेर जाण्याचा वेगही शून्याच्या जवळ पोचेल पण शून्याला गाठण्यासाठी अनंत काळ लागेल. असे सायंटिस्ट सांगतील. तत्वतः हे बरोबर आहे. प्रत्यक्षात सुध्दा टाकीच्या तळाशी असलेला पाण्याचा पातळसा थर त्याला चिकटून राहतो. तो गुरुत्वाकर्षणाने कधीच वाहून जात नाही. या परिस्थितीत गुरुत्वाकर्षणाचा जोर अत्यंत क्षीण झालेला असतो आणि पाण्याचे सरफेस टेन्शन, व्हिस्कॉसिटी वगैरेंचा प्रभाव जास्त झाल्यामुळे टाकीच्या तळाशी थोडे पाणी शिल्लक असले तरी तोटीमधून पाणी बाहेर निघणे बंद होते. हे घडण्यासाठी अनंत काळापर्यंत थांबायची गरज नाही. यामुळे हे उत्तरसुध्दा बरोबर नाही.

माझ्यासारखा एक इंजिनियर यातले कोणतेही उत्तर देणार नाही. आळशीपणा करून मी एक सोपे तोंडी गणित केले. पाण्याचा तोटीमधून बाहेर पडण्याचा वेग सुरुवातीला एका मिनिटाला दोन लीटर असा होता आणि अखेरीस तो शून्य होणार, म्हणजे सरासरीने दर मिनिटाला एक लीटर एवढा धरला तर वीस लीटर पाणी वीस मिनिटात बाहेर पडेल. हे उत्तर मी टंकणार होतो, पण त्यापूर्वी आधी आलेली उत्तरे वाचली. त्यात वर दिलेली उत्तरे होतीच, शिवाय मौजमजा म्हणून या प्रश्नाला अनेक फाटे फोडलेले होते. ते पाहून मी आपला बेत बदलला आणि कॉलेजमध्ये असतांना ऐकलेले एक मजेदार असे अशा प्रकारचे उदाहरण दिले.
पण मला असेही जाणवले की काही लोकांना बरोबर उत्तर जाणून घेण्याची इच्छा आहे. मला आलेल्या एका संदेशात असे लिहिले होते, "उंची नसल्यामुळे उत्तर कसे काढणार?? मी Bernoulli principle चा विचार केला पण त्यासाठी उंची लागेलच ना?" त्यामुळे मला या विषयावर थोडे खोलात जाऊन काम करण्याची प्रेरणा मिळाली. कोडे घालतांना पाण्याची उंची दिलेली नाहीच, टाकीचा आकारही दिलेला नाही. ती त्रिकोणी, चौकोनी, गोल अशा कोणत्या आकाराची आहे, ती उभी आहे की पसरट आहे तेही ठाऊक नाही. शिवाय ते पाणी समुद्रातले आहे की नदीतले, त्याचे तपमान किती आहे वगैरे माहितीही नाही. प्लँटचे डिझाईन करतांना अशा अनेक गोष्टींचा उपयोग केला जातो.

पण पुरेशी माहिती नाही म्हणून इंजिनियर अडून बसत नाही. जेवढी माहिती उपलब्ध असेल तिचा पुरेपूर उपयोग करायचा आणि जी नसेल त्याबद्दल आपल्या अनुभवावरून अंदाज बांधायचा, काही बाबी गृहीत धरायच्या आणि पुढे जायचे असे त्याने करायचे असते. भरलेली टाकी रिकामी होईपर्यंत तिच्यात खारे, गोडे, थंड, गरम वगैरे जे पाणी आहे, ते जसे असेल तसेच राहणार, त्याचे गुणधर्म बदलणार नाहीत असे गृहीत धरायला काहीच हरकत नाही. टाकीचा आकार चित्रात दाखवल्याप्रमाणे कसलाही असणे शक्य असले तरी प्रत्यक्षात बहुतेक ठिकाणी त्या सिलिंडर किंवा चौकोनी आकाराच्याच असतात. या आकारांमध्ये टाकीचे क्षेत्रफळ (क्रॉस सेक्शन एरिया) तळापासून वरपर्यंत सारखेच असते. त्यामुळे गणित मांडणे सोपे होते.
टाकीचे घनफळ २० लिटर आहे आणि पहिल्या एका मिनिटात २ लिटर पाणी तोटीमधून बाहेर पडले एवढी माहिती दिली आहे. याचाच अर्थ पहिल्या एक मिनिटात एक दशांश एवढे पाणी बाहेर पडले आणि त्यामुळे पाण्याची पातळी एक दशांशाने खाली आली असा होतो. मी टाकीची उंची दहा विभागात (झोन्समध्ये) विभागली. प्रत्येक विभागातल्या पाण्याची तळापासूनची उंची वेगळी असल्यामुळे तोटीमधून बाहेर पडण्याचा वेगही त्यानुसार निराळा असणार, पण तो उंचीच्या वर्गमूळाच्या प्रमाणात असणार. दिलेल्या माहितीमधील (पहिल्या मिनिटातील) वेगाशी तुलना करून तो वेग मिळाला की तेवढ्या वेगाने त्या विभागातील सर्व पाणी बाहेर येण्यासाठी किती वेळ लागेल हे गणित करणे अगदी सोपे आहे. असा रीतीने सर्व दहा भागांना लागणारा वेळ काढला आणि त्याची बेरीज करून टाकी रिकामी होण्याला लागणारा वेळ मिळाला.

हे करतांना तीन निरनिराळ्या गोष्टी गृहीत धरल्या.

१. प्रत्येक विभागाच्या वरील टोकाएवढी त्यातील पाण्याची उंची धरून त्यामुळे पाण्याचा जेवढा वेग येईल तेवढ्याच वेगाने त्या विभागातले सर्व पाणी बाहेर आले. (हे पूर्णपणे खरे नाही, पण सोपे आहे.)

२. प्रत्येक विभागाच्या मध्यपातळीएवढी त्यातील पाण्याची उंची धरून त्यामुळे पाण्याचा जेवढा वेग येईल तेवढ्याच वेगाने त्या विभागातले सर्व पाणी बाहेर आले. (हे सत्यपरिस्थितीच्या किंचित अधिक जवळ आहे)

३. प्रत्येक विभागाची मध्य पातळी ठरवतांना त्यांच्या उंचींच्या वर्गमूळांचा (रूट मीन स्क्वेअर्स) विचार करून जी उंची निघते तेवढी त्यातील पाण्याची उंची धरून त्यामुळे पाण्याचा जेवढा वेग येईल तेवढ्याच वेगाने त्या विभागातले सर्व पाणी बाहेर आले. (हे सत्यपरिस्थितीच्या जास्त जवळ आहे)
यांची उत्तरे अनुक्रमे १५.८८ मिनिटे, १९.४९ मिनिटे आणि १७.६३ मिनिटे इतकी आली.

यातील शेवटच्या एक दशांश (सर्वात तळामधील) विभाग रिकामा होण्यास लागणारा वेळ अनुक्रमे ३.१६, ६.१६ आणि ४.३६ इतका आहे. वरचे नऊ विभाग अनुक्रमे १२.७१, १३.३२ आणि १३.२७ मिनिटात संपले. तीन्ही उदाहरणांमध्ये हे आकडे जवळ जवळ सारखे आहेत.
टाकी रिकामी होण्यासाठी किती वेळ लागेल याची माहिती किती अचूक असायला हवी आणि ती काढण्यासाठी किती आटापिटा करावा लागणार आहे या मुद्यांचा सापेक्ष विचार करून योग्य त्या पध्दतीने ते गणित मांडले आणि सोडवले जाते.

यात आणखी सूक्ष्म सुधारणा करायची असल्यास टाकीमधील पाण्याच्या स्तंभांचे (कॉलम्सचे) शंभर, हजार किंवा लाख विभाग करता येतील, प्रत्येक वेळी तळामधील विभाग शून्याच्या अधिकाधिक जवळ जाईल आणि तो रिकामा होण्यास लागणारा वेळ वाढत जाऊन तो अनंताच्या दिशेकडे जाईल. पण त्या परिस्थितीत गुरुत्वाकर्षणाचा जोर अत्यंत क्षीण आणि पाण्याचे सरफेस टेन्शन, व्हिस्कॉसिटी वगैरेंचा प्रभाव पडत होत असल्यामुळे त्या गोष्टी गणितात आणाव्याच लागतील. अगदी 'बालकी खाल' काढायची झाल्यास टाकीमधील पाण्याची वरची पातळी आणि तोटीची पातळी या ठिकाणी वातावरणातील हवेचा दाब आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण सुध्दा सूक्ष्म विचार करता किंचित वेगळे असते याची दखल घेता येईल, पण हे म्हणजे 'पाय'चे उत्तर तीन पूर्णांकानंतर दिलेल्या दशांश चिन्हापुढे शेकडो, लाखो आकड्यापर्यंत काढण्याइतके निरर्थक आहे.



Thursday, November 15, 2012

केवढा चांगुलपणा ?

स्वस्थ बसून न राहता काही काम करावे असे वाटावे हा माणसाचा एक चांगला गुण आहे, ते काम स्वतःसाठी न करता दुस-यासाठी करावेसे वाटणे त्याहून चांगले आणि दुस-यासाठी केलेले काम उत्कृष्ट प्रतीचे व्हावे असे वाटणे हा तर दुर्मिळ असा सद्गुण आहे. त्यामुळे दुसरा माणूस आनंदी होईल आणि त्याच्या आनंदामधून त्या सद्गुणी माणसाला समाधान वाटेल. अशा प्रकारे दोघेही सुखी होतील. याची पुनरावृत्ती होत गेली तर सारा समाज सुखी होईल. असे तात्विक दृष्ट्या म्हणता येईल. पण प्रत्यक्षात कधी कधी तसे घडत नाही. करायला जावे (चांगले) एक आणि तसे न घडता व्हावे भलतेच असा प्रकार होतो. प्रभाताई आणि प्रमोद यांच्या बाबतीत असेच झाले.

प्रभाताई ही प्रमोदची सर्वात थोरली बहीण होती आणि त्यांच्या वयात बरेच अंतर होते. लहानग्या प्रमोदला प्रभाताईंनी तिच्या अंगाखांद्यावर खेळवले होते आणि प्रमोदला समज आल्यापासून तो तिला घरातल्या एकाद्या मोठ्या व्यक्तीसारखा मान देत आला होता. दोघेही मोठे झाले, त्यांनी आपापले संसार थाटले, त्यांचे एकमेकांकडे जाणे येणे होत राहिले. प्रभाताई अशीच एकदा प्रमोदकडे थोडे दिवस रहायला आली होती. तिचा सारा जन्म लहान गावातल्या मध्यमवर्गीय घरात गेला होता, तिथे तिला घरातली सगळी कामे करावी लागत होती, पण प्रमोदला त्या मानाने जरा चांगले दिवस आले होते. आपल्या बहिणीने आपल्या घरी चार दिवस चांगले ऐशोआरामात रहावे, तिला कसलेही कष्ट पडू नयेत असे प्रमोदला वाटत होते. घराची साफसफाई, धुणी भांडी वगैरे कामे करण्यासाठी ठेवलेल्या कामवाल्या बायका दिवसातून दोन वेळा येऊन ती सर्व कामे करून जात असत. श्रम आणि वेळ वाचवणारी स्वयंपाकघरातील जेवढी उपकरणे आणि यंत्रे बाजारात आली असतील त्यातली बहुतेक सगळी प्रमोदच्या घरी होती. त्यामुळे स्वयंपाकाचे कामसुध्दा बरेच सोपे झाले होते. घरातले कोणीही प्रभाताईला कसल्याच कामाला हात लावू देत नव्हते. तिने दिवसभर बसून किंवा वाटल्यास लोळत राहून पडल्या पडल्या आराम करावा, टीव्हीवरील कार्यक्रम पहावेत, रेडिओ किंवा टेपरेकाँर्डवर गाणी ऐकावीत, पुस्तके आणि मासिके वाचावीत, वाटल्यास आजूबाजूला फेरफटका मारून यावा, देवळात जाऊन यावे अशी प्रमोदची विश्रांतीची कल्पना होती. पण प्रभाताईच्या मनात वेगळ्या कल्पना होत्या. तिच्या दृष्टीने ज्ञान, मनोरंजन, अध्यात्म वगैरे गोष्टी चवीपुरत्या ठीक होत्या. दिवसातला सगळा वेळ त्यात घालवणे तिला कठीण जात होते. आयुष्यभर ती घरातली सगळी कामे आनंदाने करत आली होती. आतासुध्दा भावाच्या घरातही निदान थोडेसे काम केल्याखेरीज तिला चैन पडत नव्हती, पण कोणीही तिला काहीच करू देत नव्हते. प्रमोद आणि प्रतिभाला काय वाटेल अशा विचाराने ती आपल्या मनातली बेचैनी दाखवत नव्हती, आपण तिथे मजेत असल्यासारखी वागत होती.

एकदा असे झाले की प्रभाताईचा गुरुवारचा उपास असल्याने तिला संध्याकाळी जेवायचे नव्हते. हे समजल्यावर तिच्या उपासाच्या फराळासाठी प्रतिभाने साबूदाणा भिजवून ठेवला. अचानक काही आवश्यक अशा कारणाने तिला एका मैत्रिणीकडे जाणे आवश्यक झाले. प्रभाताईंना सोबत नेले तर त्यांना दगदग झाली असती, शिवाय ऑकवर्डही वाटले असते. त्यांना घरी एकटीने बसवून ठेवणेही प्रतिभाला प्रशस्त वाटले नाही. तिने फोनवर प्रमोदशी बोलून घेतले आणि काय करायचे ते ठरवले. प्रमोद ऑफीसमधून परत यायच्या वेळी ती तयार होऊन बसली आणि तो घरी येताच मैत्रिणीकडे जाण्यासाठी घराबाहेर पडली.

त्या दिवशी प्रमोदला त्याचे सर्व काम संपवण्यासाठी ऑफीसमध्ये जास्त वेळ थांबणे शक्य नव्हते. तिथली एक दोन कामे त्याच्याबरोबर घरी आली. त्यांचा शांतपणे अभ्यास करून आणि त्यावर विचार करून त्याला निर्णय घ्यायचा होता. घरी आल्यावर त्याने कपडे बदलले आणि बॅग उघडून तो कामाचे कागद बाहेर काढणार होता तेवढ्यात त्याला प्रभाताईची हाक ऐकू आली. आपल्याला नको म्हणणारे कोणी नाही असे पाहून प्रभाताई स्वयंपाकघरात गेल्या होत्या. त्यांची हाक ऐकून प्रमोद लगेच तिथे गेला. तिने साबूदाण्याची खिचडी करण्याची तयारी केली होती आणि त्यासाठी तिला कढई पाहिजे होती. त्याच्या स्वयंपाकघरात ओट्याच्या खाली खण करून त्यात भांडी ठेवण्याची व्यवस्था होती आणि काही डबे ठेवले होते. ओट्यापासून दोन हात मोकळी जागा सोडून वरच्या बाजूला कप्पे केले होते आणि काही डबे त्यात ठेवले होते. ओट्याखाली ठेवलेले सामान काढण्यासाठी खाली वाकावे लागत होते आणि वर ठेवलेले सामान काढण्यासाठी स्टूलावर चढावे लागत होते. वयोमानानुसार प्रभाताईंना या दोन्ही गोष्टी करणे कष्टाचे किंवा धोक्याचे होते. तिला स्वयंपाकघरातले कसले काम न सांगण्यामागे हेही एक कारण होते. शिवाय गॅस, ओव्हन, मिक्सर वगैरेंचा वापर कसा करायचा हे तिला माहीत नव्हते.

स्वयंपाकघरात कुठे कुठे काय काय ठेवले असेल हे प्रमोदला नीटसे ठाऊक नव्हतेच. त्याने अंदाजाने कढई शोधून काढून दिली, त्याबरोबर झाराही दिला. साबूदाण्याची खिचडी कशी करतात आणि त्यासाठी कोणकोणते जिन्नस लागतात हे त्याला माहीत नव्हते आणि ते कुठे ठेवले असतील याचीही कल्पना नव्हती. स्वयंपाकघरात आणलेला प्रत्येक पदार्थ ते नाव लिहिलेल्या ठराविक डब्यातच भरून तो डबा ठराविक फडताळातल्या ठरलेल्या जागीच ठेवायचा अशी शिस्त त्यांच्या घरी नव्हती. प्रभाताईला पाहिजे असलेले जिन्नस तिलाच शोधायला सांगणे त्याला योग्य वाटले नाही. कढई मिळताच तिने शेंगदाण्याचे कूट कुठे आहे ते विचारले. तयार केलेले कूट घरात असेल की नाही याची प्रमोदला खात्री नव्हती. निरनिराळे डबे काढून ते उघडून पहातांना त्याला एका डब्यात कच्चे शेंगदाणे सापडले. त्याने ते भाजले आणि मिक्सर चालवून त्याचे कूट करून दिले. त्यानंतर तूप, जिरे, खोबरे, मीठ, साखर वगैरे एक एक गोष्टीचं नाव काढताच प्रमोद ती शोधून काढून देत राहिला, तसेच गॅस पेटवायचा, विझवायचा, त्याची आच कमी किंवा जास्त करायची वगैरे कामांसाठी तो स्वयंपाकघरात जा ये करत राहिला.
तो विचार करत होता की प्रभाताईला साबूदाण्याची खिचडी हवी आहे असे तिने तासाभरापूर्वी सांगितले असते तर प्रतिभाने ती करून दिली असती. तिला मैत्रिणीच्या घरी जायला उशीर होऊ नये म्हणून कदाचित तिने प्रतिभाला सांगितले नसेल. अजून तासाभरात प्रतिभा परत आली असती आणि तिने त्यानंतर खिचडी करून दिली असती. पण तिला यायला उशीर लागला असता तर प्रभाताईला तोपर्यंत उपाशी रहावे लागले असते. त्याला स्वतःला साबूदाण्याची खिचडी करणे येतच नव्हते. त्यामुळे ताईला जे जे भांडे किंवा जिन्नस लागेल ते ते तो शोधून देत राहिला.
सगळे काम संपले असे पाहून प्रमोदने आपली बॅग उघडून त्यातले कागद बाहेर काढले. ते वाचायला तो सुरुवात करत होता तेवढ्यात प्रभाताईने साबूदाण्याच्या खिचडीने भरलेली प्लेट आणून त्याच्या हातात दिली. तो उद्गारला, "अगं ताई, तुझा उपास आहे ना? तूच ही प्लेट घे. मी जेवणात खाईन."

संध्याकाळच्या या वेळी काही खाण्याची त्याला सवय नव्हती आणि गरजही वाटत नव्हती. उलट अवेळी जास्तीचे खाण्यामुळे रात्रीचे जेवण व्यवस्थित होणार नाही आणि पचनसंस्था नीट राहणार नाही असे त्याला वाटत असे आणि तो शक्य तोवर ते टाळत असे.

पण प्रभाताई म्हणाली, "अरे, आत्ता गरम गरम खाऊन घे. जेवणापर्यंत ती थंड होऊन गेल्यावर तिची चंव राहणार नाही."

तो म्हणाला, "ठीक आहे. तू ही प्लेट घे. मी बशीत थोडी खिचडी घेऊन खाईन."

ताई म्हणाली, "नाही रे, तुपातले पदार्थ खाऊन अलीकडे मला खोकला येतो आणि शेंगदाण्याने पित्त होते म्हणून मी खिचडी खाणं सोडलं आहे."

हा धक्का प्रमोदला अनपेक्षित होता. तो म्हणाला, "मग तू रात्री काय खाणार आहेस ? आणि ही खिचडी कुणासाठी बनवलीस ?"

ताई म्हणाली, "मी थोडी फळं आणि दूध घेईन. तुला खिचडी आवडते ना, म्हणून तुझ्यासाठी तर ही बनवली आहे."

प्रमोदने नाइलाजाने प्लेटमधून चमचाभर खिचडी उचलून तोंडात टाकली. घास खाऊन झाल्यावर "मस्त झाली आहे." असं तो सांगणार होता तेवढ्यात ताई उद्गारली, "कशी झालीय् कुणास ठाऊक!"

तो म्हणाला, "असं का म्हणतेस? किती वर्षांपासून तू खिचडी करते आहेस? ती बिघडणं कसं शक्य आहे? "

ताई म्हणाली, " फोडणीत घालायला ताजी हिरवी मिरची मिळाली असती तर चांगला स्वाद लागला असता. "

आता मात्र प्रमोदला रहावलं नाही. आपल्या हातातलं महत्वाचं काम सोडून इतका वेळ तो निरनिराळ्या वस्तू आणि जिन्नस शोधून तिला देत होता. 'मिरची' म्हंटल्यावर त्याने शोधून काढून दिलेल्या मिरच्या हिरव्या होत्या की लाल, शिळ्या होती की ताज्या इकडे त्याने पाहिले नव्हते आणि त्याने काही फरक पडेल असेही त्याला वाटले नव्हते. तेवढीच उणीव ताईने काढावी याचे त्याला आश्चर्य वाटले.

तो म्हणून गेला, "आपल्या आईबाबांनी तर असं शिकवलं होतं की समोर येईल ते अन्न पूर्णब्रह्म म्हणून खाऊन घ्यायचं असतं आणि त्याला नावं ठेवायची नसतात. त्यामुळे मी तरी असली एवढी चिकित्सा कधी केली नाही."

प्रभाताईंचा चेहेरा खर्रकन उतरला आणि त्या देवासमोर जाऊन स्तोत्र म्हणत बसल्या. प्रमोदनं आपली प्लेट बाजूला सरकवून दिली आणि ऑफीसमधून आणलेल्या कागदात डोके खुपसले. पण आपण काय वाचत आहोत ते त्याला समजत नव्हते.

प्रभाताई आणि प्रमोद दोघेही मनाने खूप चांगले होते, दोघेही आपापल्या परीने एकमेकांचा विचार करून कृती करत राहिले, पण अखेर त्यातून त्यांच्यात थोडासा दुरावाच निर्माण झाला. त्यापेक्षा त्यांनी एकमेकांना विचारून घेतले असते तर ?

Monday, November 12, 2012

दिवाळीतले फटाके



आश्विन अमावास्येच्या काळोखात दिव्यांच्या रांगा लावून 'दीपावली' साजरी करण्याची परंपरा 'दिवाळी' या सणाने सुरू झाली. त्याला शेकडो वर्षांचा काळ उलटून गेला. आजही धार्मिक परंपरा किंवा शास्त्र म्हणून दिवाळीमध्ये रोज संध्याकाळी घरोघरी तेलाच्या पणत्या लावल्या जातातच. पण विजेच्या दिव्यांचा लख्ख प्रकाश मिळण्याची सोय झाल्यानंतर निरनिराळ्या प्रकारचे आकाशकंदील आणि झगमगणा-या दिव्यांच्या माळांनी अत्यंत नेत्रदीपक अशी रोषणाई करणे सुरू झाले. आज कोणत्याही शहरात एक फेरफटका मारून पाहिल्यास त्याची प्रचीती येईल. लहान मुलांनी विजेशी खेळणे सुरक्षित नसते आणि त्यांना ते करणे शक्यही नसते म्हणून बहुतेक घरी हे काम मोठी माणसेच करतात. दिवाळीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे फराळ. पूर्वीप्रमाणे आता सगळे खाद्य पदार्थ घरी तयार करण्याची खटपट केली जात नाही. मोठ्या शहरात तर मिठायांचे इतके वेगवेगळे प्रकार आता मिळतात आणि ते आकर्षक वेष्टनांमध्ये विक्रीसाठी मांडून ठेवले जातात की दिवाळीसाठी तेच मोठ्या प्रमाणात आणले जातात. हल्लीच्या काळात वर्षभरच चांगले चुंगले खाऊन जिभेचे चोचले पुरवणे चाललेले असते. त्यामुळे दिवाळीच्या फराळाची पूर्वीसारखी अपूर्वाई राहिली नाही. या सगळ्यांच्या तुलनेत दिवाळी म्हंटले की लहान मुलांना लगेच कशाची आठवण प्रकर्षाने येत असेल तर ती फटाक्यांचीच !


पुराणातल्या कहाण्यांमध्ये फुलापानांच्या माळा, गुढ्या, तोरणे, रांगोळ्या वगैरे इतर प्रकारच्या सजावटीचे उल्लेख सापडतात, दीपज्योती तर कुठल्याही मंगल प्रसंगी आवश्यकच असते, पण गंमत म्हणून धडाडधूम आवाज करणारे फटाके उडवणे दिसत नाही. स्फोटकांचा शोध चीनमध्ये लागला आणि फटाक्यांचा उपयोगही सर्वात आधी म्हणजे सातव्या शतकात चीनमध्ये सुरू झाला. त्याचे तंत्रज्ञान तिकडून युरोपमध्ये गेले आणि त्यांनी त्यात प्रचंड प्रगती आणि सुधारणा केली. ब्रिटीशांच्या काळात त्याची भारतात आवक झाली आणि फटाके उडवणे हा कोठल्याही उत्सवाचा अविभाज्य भाग झाला. इतर समारंभ एका कुटुंबापुरते किंवा एका समूहापुरते मर्यादित असतात, पण दिवाळी हा सर्वांचाच सण असल्याने त्याचे कानठळ्या बसवणारे आवाज एकाच वेळी सगळ्या बाजूने येत राहतात.


प्रकाश आणि ध्वनि यांच्या निर्मितीमधून काही धमाल उडवण्याचा प्रयत्न दिवाळीत उडवायच्या दारूमधून केला जातो. त्यामुळे लहान किंवा मोठा आवाज करणारे फटाके आणि निरनिराळे प्रकाश उत्पन्न करणारी उत्पादने असे दोन मुख्य प्रकार यात असतात. याशिवाय आकाशात उडणारे अग्निबाण असतात, तसेच यांना एकत्र आणणारे फटाके असतात. कशात आधी अग्निबाण आकाशात उडतो आणि वर गेल्यानंतर त्याचा स्फोट होऊन धमाका होतो किंवा त्यातून चमकदार ठिणग्यांचा वर्षाव होतो. लहानशा फटाकडीपासून सुतळी बाँबसारख्या मोठ्या फटाक्यापर्यंत त्यात अनेक प्रकार असतात, तसेच फुलबाजी, भुईचक्र आणि कारंजे वगैरे निरनिराळ्या प्रकाराने प्रकाशाची आतिशबाजी केली जाते. त्यातही एकाच रंगाच्या किंवा विविध रंगांच्या ठिणग्या उडवल्या जातात.

हे सारे फटाके कोणत्या तत्वावर काम करतात हे अनेकांना ठाऊक नसते पण ते जाणून घ्यायची इच्छा असते. त्यांचे कुतूहल शमवण्याचा एक लहानसा प्रयत्न या लेखात केला आहे. आपण साधा कागद किंवा लाकडाचा तुकडा जाळतो तेंव्हा त्यांच्यामधील मुख्यतः कार्बन व हैड्रोजनच्या अणूंचा हवेमधील प्राणवायूच्या अणूंशी संयोग होऊन कार्बन डायॉक्साईड वायू आणि पाण्याची वाफ तयार होते आणि त्या रासायनिक क्रियेत या पदार्थांमधून ऊष्णता बाहेर पडते. त्यामुळे त्या ठिकाणचे तपमान वाढते आणि त्यातून निघालेल्या प्रकाशकिरणांमुळे आपल्याला जाळ दिसतो, तसेच त्यात हात घातल्यास हाताला चटका बसतो. या जळण्यात कागद किंवा लाकडामधील काही कण जळत नाहीत, त्यातले सूक्ष्म कण हवेत पसरल्यामुळे त्यातून धूर तयार होतो आणि काही कण राखेच्या रूपाने खाली राहतात. ज्वलनाची क्रिया होण्यासाठी जळणारा पदार्थ आणि प्राणवायू यांची आवश्यकता असते आणि ही क्रिया उच्च तपमानालाच होऊ शकते. यामुळे वातावरणाच्या तपमानात (रूम टेंपरेचरला) कागद किंवा कपडे ठेवल्या जागी आपोआप पेट घेत नाहीत.

गंधक, कापूर यासारखे ज्वालाग्राही पदार्थ पटकन पेटतात आणि भुरूभुरू जळतात. काही रासायनिक पदार्थांमध्ये जादा प्राणवायू असतो आणि उच्च तापमानाला तो त्यांच्यामधून बाहेर पडतो. अशी रसायने आणि ज्वालाग्राही पदार्थ यांचे मिश्रण स्फोटक बनते. त्यांचे ज्वलन होण्यासाठी बाहेरील हवेमधील प्राणवायूची आवश्यकता नसते. एका ठिणगीने त्यांच कण पेटवले की त्यांच्या ज्वलनामधून अधिकाधिक ऊष्णता बाहेर पडत जाते आणि ते जळत जातात. बंदुका व तोफा यांना उडवण्यासाठी लागणारी किंवा सुरुंगाची दारू या प्रकारची असते. दिवाळीच्या फटाक्यांमध्ये याच प्रकारची दारू सौम्य रूपात वापरली जाते.

फटाका तयार करतांना कागदाची जाड गुंडाळी करून त्यात ही दारू भरतात आणि त्याला जोडलेली एक कागदाची वात बाहेरपर्यंत ठेवली जाते. या वातीवर दारूचा पातळसा थर दिलेला असतो. ती पेटवली की हळूहळू आतपर्यंत जळत जाते. यामुळे पेटवणा-याला दूर पळायला वेळ मिळतो. कागदाच्या गुंडाळीच्या आतील दारू बाहेरील हवेशिवायच पेट घेते. त्यांच्या ज्वलनातून जे वायू बाहेर पडतात त्यांचे आकारमान मूळ स्थितीच्या शेकडो पटीने जास्त असते आणि त्यांना व्यापण्यासाठी फटाक्याच्या आत पुरेशी जागा नसल्यामुळे त्या वायूचा दाब वाढत जातो. कागदाचे वेष्टण आतल्या बाजूने जळत जाऊन कमकुवत होत जाते. अखेर आतला दाब सहन न झाल्यामुळे ते टराटरा फाटते आणि आतील वायू सर्व बाजूंनी वेगाने बाहेर पडतो. त्यामुळे हवेत कंपने निर्माण होऊन मोठा ध्वनि निघतो. हे सगळे क्षणार्धात होते. फटाक्यामधील दारूचा प्रकार आणि प्रमाण यानुसार लहान किंवा मोठा स्फोट होऊन थोडा किंवा कानठळ्या बसवणारा आवाज निघतो. अगदी लहानशा कागदाच्या दोन गोल तुकड्यांमध्ये कणभर दारू ठेवून टिकली तयार होते. ती खेळातल्या पिस्तुलात ठेऊन तिचा घोडा ओढला की पिस्तुलातला खटका दाणकन टिकलीवर आदळून तिच्यातल्या दारूचा लहानसा स्फोट होतो. अनेक फटाके एकमेकांना जोडून त्यांची माळ तयार करतात आणि त्यातले सारे फटाके एकदम न उडता ते एकामागोमाग एक करून उडावेत अशी त्यांची रचना केली असल्यामुळे ती माळ काही सेकंद किंवा मिनिटे तडतडत राहते.
फटाक्याच्या वेष्टनाची गुंडाळी करतांना तिच्या एका बाजूला मोकळी वाट ठेवली तर ज्वलनामुळे आत निर्माण झालेले वायू त्यातून वेगाने बाहेर पडतात आणि न्यूटनच्या तिस-या नियमानुसार त्याच्या प्रतिक्रियेमुळे तो फटाका उलट बाजूने दूर फेकला जातो. अग्निबाणामधील फटाक्याला खालच्या बाजूने मोकळी वाट असते. त्यातून हे ऊष्ण वायू बाहेर पडतात आणि काडीला जोडलेला फटाका आभाळात उड्डाण करतो. त्याच फटाक्यातल्या दुस-या कप्प्यात आणखी थोडी दारू भरलेली असते. बाण आकाशात उंच उडल्यानंतर ती दारू पेटते आणि तिचा स्फोट होतो.
शोभेच्या दारूला जाड वेष्टण नसते. तिचा एकदम स्फोट होऊ नये म्हणून तिच्यात काही न जळणारी रसायने किंवा धातूंचा भुगा मिसळतात. त्यांना तापवल्यावर उच्च तपमानाला त्यांचा रंग बदलतो. उदाहरणार्थ कॅल्शियमचा रंग केशरी होतो तर सोडियमचा पिवळा, तांब्याचा निळा तर बेरियमचा हिरवा. पांढरा शुभ्र प्रकाशासाठी मुख्यतः मॅग्नेशियम किंवा अॅल्युमिमियमचा वापर होतो. मॅग्नेशियम धातू स्वतःच ज्वालाग्राही असल्यामुळे त्यातूनच अत्यंत चमकदार अशा ठिणग्या पडतात. फुलबाजी पेटवली की तिच्या काडीला चिकटवलेली दारू किंवा मॅग्नेशियमची पूड जळत राहते. त्याचबरोबर या भुग्याचे कण तापून चमकतात आणि त्यांच्यामधून रंगीबेरंगी प्रकाशकिरण बाहेर पडतात. भुईचक्र तयार करण्यासाठी ही शोभेची दारू एका कागदात गुंडाळून तिचे वेटोळे लहानशा भिंगरीला चिकटवतात. त्यामुळे ती प्रकाशाचे झोत टाकत स्वतःभोवती गोल गोल फिरत राहते. एका कोनिकल आकाराच्या वेष्टनात बरीच दारू भरून ठेवली तर त्याचे झाड किंवा कारंजे होते.


फटाके तयार करतांना त्यातून होणारे स्फोट विध्वंसक होऊ नयेत इतपत लहान ठेवले असतात, पण माणसाला धाडसाचे वेड असल्यामुळे तो त्याचा आकार वाढवत जातो. असे मोठ्या आकाराचे फटाके उडवतांना पुरेशी काळजी घेतली नाही आणि कोणी त्या फटाक्याच्या अगदी जवळ आला तर स्फोटाच्या धक्क्याने त्याला इजा होऊ शकते. ढिले किंवा ज्वालाग्राही कपडे पेट घेऊन तो माणूस भाजू शकतो. फार मोठ्या आवाजाने त्याचे कान बधीर होऊ शकतात. एकादी ठिणगी डोळ्यात गेल्यास अंधत्व येऊ शकते. लहान मुले आणि वृध्द लोकांची सहनशक्ती कमी असते. त्यामुळे जो प्रखर उजेड किंवा आवाज मोठे लोक सहन करू शकतात, त्यांच्यामुळे लहान मुलांना किंवा वृध्दांना इजा होऊ शकते. पर्यावरण हा एक नवा मुद्दा अलीकडे अधिकाधिक महत्वाचा होत चालला आहे. दिवाळीनिमित्य फार मोठ्या प्रमाणात फटाके उडवले गेल्यामुळे त्यांच्या ज्वलनामधून निघालेले विषारी वायू हवेत मिसळतात आणि त्रासदायक ठरतात. ज्या लोकांची श्वसनसंस्था कमकुवत असते अशा लोकांना श्वास घेणेसुध्दा जड जाऊन त्यांचा जीव व्याकूळ होतो. या सगळ्यांचा विचार करून केवळ मौज म्हणून फटाक्यांवर कमी भर देणेच योग्य आहे.

Saturday, November 10, 2012

चंद्राची गाणी - भाग ४ - इतर गीते

निसर्गातून सगळ्या चांगल्या गोष्टी वेचून घेण्याच्या इच्छेने एक प्रेमिका चंद्रिकेकडे प्रीतीचे वरदान मागते. चंद्राला यावेळी चंद्रिका असे संबोधून ती तिला आपली मैत्रिण बनवते. यासाठी पौर्णिमेचा पूर्ण चंद्र कामाचा नाही, द्वितीयेची नाजुक कौरच हवी.


दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी, रानहरिणी दे गडे भीती तुझी ।।
मोहगंधा पारिजाता रे सख्या, हांसशी कोमेजतां रीती तुझी ।।
रे कळंका छेदितां तुज जीवनी, सुस्वरे जन भारिते गीती तुझी ।।
सोशितोशी झीज कैसी चंदना, अपकारिता उपकार ही नीती तुझी ।।

या गाण्यामधील सर्व उदाहरणे ही त्यागाची आहेत. पारिजाताचे फूल, वेळूचे (बांबूचे) झाड, चंदनाचे खोड हे सर्व स्वतः नष्ट होऊन त्यातून दुस-यांना सुखी करतात. सुरेख दिसणारी चंद्राची कोर आणि भित्री हरिणी यांना त्यांच्या पंक्तीत का बसवले आहे ते कवीवर्य राजा बढेच जाणोत. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांच्या दीदी लताताई यांनी जनसंमोहिनी रागामधील मधुर सुरावटीतून श्रोत्यांवर अजब मोहिनी घातली आहे.


पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राची उपमा सुंदर चेहे-याला नेहमी दिली जातेच तर द्वितीया आणि तृतीयेची चंद्रिका अत्यंत आकर्षक असते. अंगाने थोड्या भरलेल्या चवतीच्या चंद्रकोरीचा सुध्दा केवढा झोक?

कशी झोकांत चालली कोळ्याची पोर ?
जशी चवतीच्या चंद्राची कोर ।।

फेसाळ दर्याचं पाणी खारं ।
पिसाट पिऊनी तुफान वारं ।
उरात हिरव्या भरलं हो सारं ।
भरतीच्या ज्वानीला त्याहून जोर ।।१।।

टाकून टाकशील किती रं जाळी ?
मेघाची सावली कुणाला घावली ?
वा-यानं अजूनी पाठ नाही शिवली ।
वाटेला बांग दिली हिच्यासमोर ।।२।।

केसाची खूणगाठ चाचपून पाहिली ।
फुलांची वेणी नख-यानं माळली ।
कुणाला ठाव रं कुणावर भाळली ।
प्रीतीचा चोर तिला राजाहून थोर ।।३।।

चवतीच्या चंद्रासारखे देखणे रूप मिळालेल्या पोरीने ते अधिक खुलून दिसावे यासाठी थोडा साजश्रुंगार केला कारण राजापेक्षासुध्दा जास्त महत्वाचा असा तिच्या प्रीतीचा चोर तिला भेटणार असावा. कोळ्याच्या देखण्या मुलीचे वर्णन करतांना कविवर्य गदिमांनी ग्रामीण भागातील जीवनाचे सुंदर दर्शन या गीतात घडवले आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमधील चित्रपटांना मधुर संगीत देऊन ज्यांनी अमर केले असा वसंत देसाई यांनी बांधलेल्या स्वररचनेला आपल्या गोड आवाजातल्या ठसक्याने आशा भोसले यांनी अधिकच बहार आणली आहे.


प्रेम, सौंदर्य वगैरे दर्शवणारी चन्द्राची इतकी रूपे पाहिली. आता थोडी वेगळी रूपे पाहू. यमुनेच्या पलीकडे रहाणा-या कुब्जेला पहाटेच्या वेळी श्रीकृष्ण भेटायला गेला त्या प्रसंगाचे वर्णन करतांना कवयित्री इंदिरा संत म्हणतात,

अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ ।
अशा अवेळी पैलतीरावर, आज घुमे का पांवा मंजुळ ।।

मावळतीवर चंद्र केशरी, पहाटवारा भंवती भणभण ।
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती, तिथेच टाकुन अपुले तनमन ।।

विश्वचि अवघे ओठा लावुन, कुब्जा प्याली तो मुरलीरव ।
डोळ्यामधले थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव ।।

अशा अवेळी पैलतीरावर आज घुमे कां पांवा मंजुळ ।
अजून नाही जागी राधा अजून नाही जागे गोकुळ ।।

एरवी नुकताच उगवलेला 'चंद्र पुनवेचा' नेहमी कौतुकाचा असतो, पण मधुर गळ्याची गायिका सुमन कल्याणपूर आणि संगीतकार दशरथ पुजारी या द्वयीने दिलेल्या या भावगीतात मावळतीवर आलेल्या केशरी चंद्राच्या उल्लेखाने पहाटेची वेळ दाखवली आहे.
संत जनाबाई विठ्ठलाची इतकी लाडकी होती की तिला घरकामात मदत करण्यासाठी तो स्वतः तिच्या घरात येत असे. गीतकार शांताबाई जोशी यांनी लिहिलेल्या एका जुन्या गाण्याची चाल एका काळातले भावगीतांचे सम्राट गजानन वाटवे यांनी बांधली होती आणि माणिक वर्मा यांनी ते गयिले होते. जनाबाईची श्रध्दा पाहून तिचा कामाचा भार हलका करण्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग तिला दळण दळायला मदत करतो तेंव्हा ती हर्षभरित होऊन म्हणते,

आभाळीचा चांद माझ्या आज अंगणात ।
पंढरीचा रावा दळी जनीच्या घरात ।।
किती करी काम देवा, घेई रे विसावा ।

हेच ऐक एवढे रे, मान किती घ्यावा ।
घनश्याम विठ्ठला रे, पंढरीच्या राया ।
धावुनिया भक्तांपाठी, वृथा शिणवाया ।
जरा थांबू दे रे देवा, कोमल दे हात ।।

किती माझ्यासंगे, गाउनिया गाणी ।
भागलीस आता, तू रे चक्रपाणी ।
कटी पितांबर शोभे, तळा वैजयंतीमाळा ।
असा हरी गरीबांच्या, झोपडीत झोपी गेला ।
सावळीच गोजिरी ही, मूर्ती सदा नयनात ।।


सूर्य आणि चंद्र पृथ्वीवर प्रकाशकिरणांचा वर्षाव करतात. त्या उजेडात उजळून निघालेल्या पृथ्वीकडे आकाशातले देवच सूर्य व चंद्र या डोळ्यांनी पहात असतात अशी कल्पना आहे. मृत्यू पावलेले जीव स्वर्गात म्हणजे देवलोकात गेल्यानंतर ते सुध्दा असेच पहात असतील अशी कल्पना कवी पी. सावळा राम यांनी केली आहे. आपल्या लाडक्या कन्येचे आयुष्य सुखात जावे, तिला कशाची ददात पडू नये यासाठी तिला चांगले शिक्षण, कला कौशल्य वगैरेंमध्ये निपुण करून एका त-हेने तिच्यासाठी कल्पवृक्ष लावून गेलेल्या बाबांची आठवण काढून त्यांची यशस्विनी झालेली लाडकी लेक म्हणते,

सूर्य चंद्र तुमचे डोळे, दुरूनीच हो बघतात ।
कमी नाही आता कांही, कृपादृष्टीची बरसात ।
पांच बोटे अमृताची, पंचप्राण तुमचे त्यात ।
पाठीवरी फिरवा हात, या हो बाबा एकच वेळा ।।

या गाण्यातले भाव लता मंगेशकरांच्या व्यक्तीगत आयुष्यालासुध्दा लागू पडत असल्यामुळे त्यांनी अत्यंत समरसतेने गाऊन हे गीत अजरामर केले आहे. संगीतकार वसंत प्रभू यांनी या गीताला दिलेली चालही अप्रतिम अशी आहेच.

पी.सावळाराम, वसंत प्रभू आणि लतादीदी यांनी जी अप्रतिम गीते मराठी रसिकांना दिली आहेत त्यातलेच दुसरे एक गीत आहे.
श्रीरामा, घनश्यामा, बघशिल कधी तू रे, तुझी लवांकुश बाळे ।

वनवासाच्या घरात माझ्या, अरुण चंद्र हे सवे जन्मता ।
विरह प्रीतीचे दुःखही माझे, हंसते रघुनाथा ।
विश्वाची मी मंगल माता, तुझी लाडकी सीता ।
तुझ्याविना रे आनंदाला गालबोट लागले ।।

'चंदा है तू मेरा सूरज है तू' अशा शब्दात सगळ्या माता आपल्या मुलांचे कोतुक करत असतात. सूर्य आणि चंद्र ही तेज आणि सौंदर्य यांची प्रतीके आहेत. वाल्मिकी मुनींच्या आश्रमात आपल्या मुलांना वाढवत असतांना सीतामाई वर दिलेले गाणे म्हणते अशी कल्पना आहे.

पुण्यवान लोक मरणानंतर स्वर्गाला जातात. तेंव्हा चंद्र तारे यासारखे आकाशस्थ देव त्यांचे स्वागत करतात. देशकार्यासाठी धारातीर्थी पडलेल्या मुलाचा पिता आपला शोक आवरून म्हणतो,

पोचशी तू दिव्यलोकी सूर्यमंडळ भेदुनी ।
चंद्र तारे धन्य तुजला आरती ओवाळुनी ।

गौरवाचा ग्रंथ लाभे जीवनी तव भारता ।।
झुंजता रणभूवरी तू, अमर होशी रे सुता ।
भाग्य माझे थोर म्हणुनी जाहलो तव मी पिता ।।


सूर्य हा सर्वात जास्त प्रकाशमान आहेच, चंद्र हा त्याच्या खालोखाल तेजस्वी दिसतो. पण हे दोघेही साध्या डोळ्यांना दिसणारा प्रकाश देऊन अंधःकार दूर करतात. सद्गुरूच्या कृपेने मन उजळून निघते. ज्ञानाचा हा प्रकाश इतका प्रखर असतो की तो सूर्यचंद्रांनासुध्दा लाजवतो. ओंकारस्वरूप समर्थ सद्गुरूंना नमन करतांना संत एकनाथ म्हणतात,

गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश, त्यापुढे उदास चंद्र रवि ।
रवि, शशि, अग्नि, नेणति ज्या रूपा, स्वयंप्रकाशरूपा नेणे वेद ।।
ओंकारस्वरूपा सद्गुरूसमर्था, अनाथांच्या नाथा तुज नमो ।।


विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेले संत गोरा कुंभार आळवणी करतात,

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर ।
चंद्र व्हा हो पांडुरंगा, नम करा थोर ।।
बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले ।
वृध्दपणी देवा आता, दिसे पैलतीर ।।

जन्म मरण नको आता, नको येरझार ।
नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार ।।
चराचरापार न्याहो लागला उशीर ।
पांडुरंग पांडुरंग मन करा थोर ।।

गीतकार अशोकजी परांजपे यांनी लिहिलेल्या या नाट्यगीताला संगीतकार जितेंद्र अभिषेकी यांनी दिलेली चाल इतकी सुरेख आहे की गायनाच्या अनेक मैफलींची सांगता या भैरवीने केली जाते.



ज्ञानेश्वरी ग्रंथाचे शेवटी पसायदान मागतांना संत ज्ञानदेव विनंति करतात,

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वाही सदा सज्जन । सोयरे होतु ।।

जगातल्या सर्व लोकांचे प्रत्यक्ष सूर्य चंद्राबरोबर नाते जुळावे, ते सुध्दा काळिमा नसलेला चंद्र आणि दाहक नसलेला सूर्य यांच्याबरोबर, असे मागणे त्यांनी केले आहे. सर्व लोकांनी सज्जन आणि तेजस्वी व्हावे पण त्याबरोबर निष्कलंक रहावे आणि तापदायक होऊ नये असा संदेश या पसायदानांमध्ये दिलेला आहे.



 . . . . .  . . (समाप्त)

Tuesday, November 06, 2012

चंद्राची गाणी - भाग ३ - विरहगीते

चंद्र आणि प्रेम यांच्यात किती जवळचा संबंध आहे हे मागील भागात दिलेल्या गीतांवरून पाहिलेच आहे. चंद्राच्या आभाळातल्या अस्तित्वानेच जशा समुद्रात लाटा उठतात तशाच प्रेमिकांच्या मनातही उठतात. ते एकमेकांच्या सहवासात असतील तर त्यांच्या मनातल्या भावनांचा आवेग जास्तच वाढतो. पण असे चांदण्या रात्रीच्या धुंदीमध्ये एकत्र येऊन न्हाऊन निघणे सर्वच प्रेमिकांच्या नशीबात नसते. त्यातले अनेक दुर्दैवी जीव विरहव्यथा भोगत असतात. त्यातलीच कुणी आर्जवे करते (किंवा करतो) की या पौर्णिमेच्या रात्री एकदा तरी येऊन मला भेटून जा, कधीपासून माझ्या मनात साठून राहिलेल्या मृदु भावना इतक्या प्रबळ आहेत की त्या वाळवंटातही फुलबाग फुलवतील, अंधालाही दिसतील आणि सुखवतील. गीतकार शांताराम नांदगावकर यांनी रचलेल्या या गीतामधील भावना कवीमनाच्या संगीतकार यशवंत देव यांनी अचूक ओळखून सुमन कल्याणपूर यांच्या मधुर आवाजातून रसिक श्रोत्यांपर्यंत या गाण्यातून पोचवल्या आहेत. या गाण्यात विरहव्यथेपेक्षा आर्जव आणि आशा यांना जास्त महत्व आहे.



रात्र आहे पौर्णिमेची, तू जरा येऊन जा ।
जाणिवा थकल्या जिवांच्या एकदा ऐकून जा ।।

निथळला तो भाव सारा वितळल्या चंद्रातुनी ।
मिसळल्या मृदु भावनाही झोपल्या पानांतुनी ।
जागती नेत्रांतली ही पाखरे पाहून जा ।।१।।

पाखरे पाहून जा, जी वाढली पंखाविना ।
सूर कंठातील त्यांच्या जाहला आता जुना ।
त्या पुराण्या गीतिकेचा अर्थ तू ऐकून जा ।।२।।

अर्थ तू ऐकून जा, फुलवील जो वैराणही ।
रंग तो पाहून जा, जो तोषवी अंधासही ।
ओंजळीच्या पाकळ्यांचा स्पर्श तू घेऊन जा ।।३।।


उंबरठा या चित्रपटात एका महिलासुधारगृहात रहात असलेली एक मदनिका तिथल्या नीरस वातावरणात अस्वस्थ होत असते. तेथे यायच्या आधी ती पुरुषांच्या सहवासाला चटावलेली असते. चांदण्या रात्री त्या कामिनीला हा मदनावेग अनावर झाला आहे. तिच्याच शब्दात सांगायचे तर,

चांद मातला मातला, त्याला कशी आवरू ?
अंगी वणवा चेतला, मला कशी सांवरू ?

अशी पुनवेची निशा, चढे चांदण्याची नशा,
गेल्या हरवून दिशा, झाले खुळे पाखरू ।।

आला समुद्र ही रंगा, त्याचा धिटाईचा दंगा,
वेड्या लहरींचा पिंगा, बाई झाला की सुरू ।।

गोड गारव्याचा वारा, देह थरारला सारा,
लाख चुंबनांचा मारा, चांद लागला करू ।।

याची प्रेमपिशी दिठी, लावी चंदनाची उटी,
झाली अनावर मिठी, कुठे धीर मी धरू ?

चांद अंगणी गगनी, चांद नांदतो भुवनी,
चांद अमृताचा मनी, बाई लागला झरू ।।

कवी वसंत बापट, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या सर्व सोज्ज्वळ स्वभावाच्या कलाकारांनी मिळून हे वेगळ्या प्रकारचे अप्रतिम गीत आपल्याला दिले आहे.
आधा है चंद्रमा रात आधी, रह न जाये तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी हे हिंदी गाणे एके काळी खूप गाजले होते आणि अजून सर्वांच्या स्मरणात राहिले आहे. अशाच अर्थाचे एक मराठी गीत कवी मधुकर जोशी यांनी लिहिले आणि कवीमनाचे संगीतकार यशवंत देव यांनी कृष्णा कल्ले या गुणी गायिकेकडून गाऊन घेतले.

कुणा जोडप्याची भेट झाली आहे पण अर्धेमुर्धे बोलणे होईपर्यंत पुन्हा त्यांच्या विरहाचा क्षण आला आहे. त्यांची व्यथा ते सांगतात,

चंद्र अर्धा राहिला, रात्र अर्धी राहिली,
भेट अर्धी, गीत अर्धे, प्रीत अर्धी राहिली ।।

मोकळे बोलू कसे मी, शब्द ओठी थांबले,
लाज-या डोळ्यात माझ्या चित्र अर्धे रेखिले,
ओठ अर्धे विलगले, अर्ध उकले पाकळी ।।

बिलगुनी रमल्या तरूंशी पेंगलेल्या साउल्या,
तो निळा एकांत तेथे भावना भारावल्या,
धुंद झाल्या दशदिशा, रात्रही ओलावली ।।

वाकले आकाश खाली दूरच्या क्षितिजावरी,
चांदणे चुंबीत वारा झोपला वेलीवरी,
भेट घ्याया सृष्टि ही अर्ध झुकली, वाकली ।।


कधी कधी असे होते की प्रियकर आपल्या प्रियेला भेटलेला आहे, पण तो बिचारा इतका थकलेला भागलेला असतो की ती जवळ असतांनासुध्दा तो चक्क झोपून जातो, चांदण्या रात्रीचा आनंद पूर्णपणे उपभोगण्याचं त्राणच त्याच्यात नसतं. या अवस्थेत वियोग नसतांनासुध्दा तिचे मन विरहावस्थेच्या जवळ असते. तेंव्हा अतृप्तावस्थेतील ती म्हणते,

तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास कां रे?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे?

अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला ।
अजुन मी विझले कुठे रे? हाय ! तू विझलास का रे?

सांग, ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे, आणि तू मिटलास का रे?

बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा ।
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे?

उसळती हुदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा ।
तू किनार्‍यासारखा पण कोरडा उरलास का रे?

कवीवर्य स्व. सुरेश भट त्यांच्या कवितांमधून आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात. त्यातली मध्यवर्ती कल्पनाच अफलातून असते आणि त्यातून हवे तेवढे निरनिराळे अर्थ काढता येतील अशी गूढ पण कुशल शब्दरचना असते. वर वर दिसणा-या अर्थाहून वेगळा आणि अधिक भेदक अर्थ त्यात दडलेला आहे असे कोणा विद्वानाने सांगितले होते. अकाली निधन पावलेल्या पतीच्या पत्नीचा आकांत त्याला त्यात दिसला. कोणाला यात पुरुष आणि प्रकृती किंवा जीव आणि आत्मा यांची अवेळी झालेली ताटातूट सापडली.

संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर सुरेश भटांचे चांगले मित्र होतेच आणि त्यांच्या कवितांचा अर्थ समजून घेऊन त्याला तितकीच अफलातून चाल लावत असत. या गाण्यातला भाव पाहता त्यांनी हे गाणे आशा भोसले यांच्याकडून गाऊन घेतले आणि या दोघांनी मिळून या गाण्यात किती आर्ततेचे भाव आणले आहेत याला तोड नाही.


मधुचंद्र चित्रपटातल्या बिचा-या नायक नायिकांचे नशीबच विचित्र असते. त्या दोघांना त्यांच्या लग्नानंतर मधुचंद्राची रात्रसुध्दा तुरुंगवासामध्ये वेगवेगळी घालवावी लागते. बिच्चारे म्हणतात,

मधू इथे अन चंद्र तिथे, झुरतो अंधारात, अजब ही मधुचंद्राची रात।
एक चंद्र अन् अगणित तारे, दो हृदयांवर किती पहारे?
हवी झोपडी, मिळे कोठडी, सरकारी खर्चात, अजब ही मधुचंद्राची रात।।

माहेराला सोडुन फसले, नशिबी आले सासर असले ।
ताटातुटीने सुरेख झाली, संसारा सुरवात ।
अजब ही मधुचंद्राची रात ।।

किती पाहुणे किती निमंत्रित, जमले सारे एका पंक्‍तीत ।
अशी निघाली लग्‍नानंतर, वार्‍यावरची वरात ।
वार्‍यावरची वरात, अजब ही मधुचंद्राची रात ।।

अशा बिकट पण विनोदी प्रसंगाला साजेसे गीत ग. दि. माडगूळकर यांनी लिहिले. संगीतकार एन्‌. दत्ता हे मुख्यतः हिंदी चित्रपटांना संगीत देत असत. त्यातले काही खूप गाजलेही होते. या मराठी चित्रपटासाठी हे द्वंद गीत आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायिले.

वरील गाण्यातला चंद्र दोघांना उदासच बनवतो. तरुण आहे या गाण्यात त्याची जादू पुरेशी ठरत नाही, तशीच प्रेमाचा भर ओसरून गेला किंवा काही कारणाने त्यांच्यात कटुता आली तरी होते. काही जोडप्यांच्या बाबतीत असं होतं की प्रेमाचा पहिला बहर ओसरून गेल्यावर वास्तवाचे कांटेकुटे बोचू लागतात आणि व्यथित अंतःकरणाने तो म्हणतो,

तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी,
एकांती मजसमीप तीच तूही कामिनी ।।

नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे ।
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे ।
जाईचा कुंज तोच, तीच गंधमोहिनी ।।

सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे ?
मी ही तोच तीच तू ही, प्रीति आज ती कुठे ?
ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी ।।

त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा ।
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा ।
गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी ।।

कवयित्री शान्‍ताबाई शेळके आणि संगीतकार व गायक सुधीर फडके यांचे हे गीत म्हणजे भावगीतांच्या क्षेत्रातला एक मैलाचा दगड ठरले किंवा ते त्यातले एक उत्तुंग असे शिखर आहे असेही म्हणता येईल.
प्रत्येकाचे प्रेम सफल होतेच असे नाही. त्यात अनेक अडचणी येतात. काही वेळा त्यातून मार्ग काढणे अशक्यच असते. अशा अपरिहार्य अशा प्राप्त परिस्थितीपुढे नमते घेऊन कुणाकुणाला प्रेम वगैरे विसरून जावेच लागते. अशी एक अभागिनी म्हणते,

चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा ।
मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा ।।

आणिले धागे तुझे तू मीहि माझे आणिले ।
गुंफिला जो गोफ त्याचा पीळ तू विसरून जा ।।

मी दिली वचने तुला अन्‌ वाहिल्या शपथा खुळ्या ।
शब्द केवळ ते तयांचा अर्थ तू विसरून जा ।।

प्रीतिचे हितगूज ते, कुजबुज ती, रुसवेहि ते ।
ते हसू अन्‌ आंसवे ती, आज तू विसरून जा ।।

चंद्र ज्याला साक्ष होता, जे फुलांनी पाहिले ।
रेखिले प्राणांत जे मी तेच तू विसरुन जा ।।

कवयित्री शान्‍ता शेळके यांच्याच या गाण्यातला चंद्र साक्षीला होता, पण तो कसली मदत करू शकणार ? वसंत पवार यांनी रचलेल्या चालीवर माणिक वर्मा यांनी ही काकुळतीची विनंती किती प्रभावीपणे केली आहे ?



चंद्र किंवा चांदणे यांचा ओझरता उल्लेख तर अनेक गीतांमध्ये येतो. कुणाच्या मनात पूर्वीच्या गोड आठवणी येतात. त्या आपल्या येतात आणि जातात आणि कधी कधी ते क्षण पुन्हा अनुभवायची आशाही त्यांना चंद्र दाखवतो.

चंद्र कोवळा पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला,
जरा लाजुनी, जाय उजळुनी, काळोखाच्या राती,
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती ।।

किंवा

अजून फिक्कट चंद्राखाली, माझी आशा तरळत आहे,
गीतामध्ये गरळ झोकुनी अजून वारा बरळत आहे ।।
अजून त्या झुडुपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते ।
अजून अपुल्या आठवणींनी शेवंती लजवंती होते ।।







(क्रमशः)

Thursday, November 01, 2012

चंद्राची गाणी - भाग २ - प्रेमगीते

चंद्र आणि प्रेम यांचे अतूट नाते युगायुगापासून चालत आले आहे. महाकवी कालीदासांपासून ते आजच्या नवकवींपर्यंत ज्यांनी ज्यांनी प्रेम या विषयावर साहित्यिक कृती निर्माण केल्या आहेत त्यात कुठे ना कुठे चंद्र डोकावतांना दिसतोच. चांदण्या रात्रीच्या धुंद करणा-या वातावरणाचे वर्णन मराठी कवितेत विविध त-हेने आले आहे.

मुख्यतः शास्त्रीय संगीताला प्राधान्य देऊन त्यातल्या गाण्यांना एकत्र गुंफण्यापुरते प्रसंग टाकून अनेक संगीत नाटके तयार करण्यात आली. त्या नाटकांमधल्या गाण्यांमध्ये शब्दांना फार जास्त महत्व नसे, किंबहुना ती नाट्यगीते एकाद्या बंदिशीसारखी अगदी लहानशी असत आणि त्यातल्या ओळी पुनःपुन्हा घोळवून गायिल्या जात तरीसुध्दा अनेक गाण्यांचे बोल स्पष्टपणे ऐकू येत नाहीत. ते शब्द आलाप तानांच्या गुंत्यांमध्ये हरवून जातात. काही सुंदर गीते मात्र याला अपवाद आहेत. अशा एका भावपूर्ण आणि सुप्रसिध्द नाट्यगीताचे बोल आहेत,

उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा ।

दाही दिशा कशा खुलल्या, वनिवनि कुमुदिनी फुलल्या,
नववधु अधिर मनि जाहल्या, प्रणयरस हा चहुकडे वितळला स्वर्गिचा।।

चंद्रामुळे समुद्राला भरती येते त्याचबरोबर हृदयातल्या प्रीतीच्या सागरालाही येते आणि चंद्रोदयानंतर सारा निसर्गच आनंदमय होतो आणि प्रणयरसाने भारला जातो असे वर्णन या गीतात आहे.

चित्रपट या माध्यमात मात्र आणि विशेषतः मराठी चित्रपटांमध्ये अनेक भावपूर्ण गीते पहायला मिळतात आणि ऐकून ऐकून तोंडपाठ होतात. गीतकार जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेले असेच एक सदाबहार गीत आहे,

पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला ।
चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला ।।
चांदण्याचा गंध आला, पौर्णिमेच्या रात्रिला।
चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला ।।

स्पर्श हा रेशमी, हा शहारा बोलतो ।
सूर हा, ताल हा, जीव वेडा डोलतो ।
रातराणीच्या फुलांनी देह माझा चुंबिला ।।
चंद्र आहे साक्षिला ।।

लाजरा, बावरा, हा मुखाचा चंद्रमा ।
अंग का चोरिसी दो जीवांच्या संगमा ।
आज प्रीतीने सुखाचा मार्ग माझा शिंपिला ।।
चंद्र आहे साक्षिला ।।

चांदण्या रात्रीमधल्या अशा धुंद वातावरणाचा लाभ प्रेमिकांनी घ्यायलाच पाहिजे ना? रेडिओवरील भावसरगम नावाच्या कार्यक्रमातल्या या विषयावरील पहिल्याच गाण्याने पन्नास वर्षांपूर्वी इतिहास घडवला होता. त्या काळात या गाण्याने धमाल उडवून दिली होतीच, त्यानंतर असंख्य वेळा असंख्य कार्यक्रमात ते गायिले जाऊनही आणि ऐकूनही त्याची गोडी अजून अवीट राहिली आहे. मराठी भावगीतामध्ये हा मैलाचा दगड ठरला. कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या या गाण्याचे बोल, श्रीनिवास खळे यांनी लावलेली चाल आणि अरुण दाते व सुधा मलहोत्रा यांचे आवाज यामध्ये सर्वात जास्त सरस काय आहे ते सांगता येणार नाही. प्रेम या भावनेचा इतका तरल आविष्कार आणखी कुठे पहायला मिळणार नाही. दुसरे तिसरे काही नको, चंदेरी रातीत फक्त एकमेकांच्या जवळ असणे एवढेच या गीतातील प्रेमिकांना हवे आहे. हे प्रेमी युगल म्हणते,

शुक्रतारा मंद वारा, चांदणे पाण्यातूनी ।
चंद्र आहे स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातूनी ।
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा ।
तू अशी जवळी रहा ॥ १ ॥

मी कशी शब्दांत सांगू, भावना माझ्या तुला?
तू तुझ्या समजून घे रे, लाजणाऱ्या या फुला ।
अंतरीचा गंध माझ्या, आज तू पवना वहा ।
तू असा जवळी रहा ॥ २ ॥

लाजऱ्या माझ्या फुला रे, गंध हा बिलगे जिवा ।
अंतरीच्या स्पंदनाने, अन् थरारे ही हवा ।
भारलेल्या या स्वरांनी, भारलेला जन्म हा ।
तू अशी जवळी रहा ॥ ३ ॥


शोधिले स्वप्नात मी, ते ये करी जागेपणी ।
दाटूनी आलास तू रे, आज माझ्या लोचनी ।
वाकला फ़ांदीपरी, आता फुलांनी जीव हा ।
तू असा जवळी रहा ॥ ४ ॥


हेच कवी, संगीतकार आणि गायकगायिका यांचे आकाशवाणीच्या त्याच मालिकेतले त्या काळातले दुसरे अप्रतिम गाणे आहे. त्यातले प्रेमी युगुलही चांदण्या रात्री एकत्र आले आहे आणि हातात हात घेऊन बसले असतांना त्यांना रोजचाच चंद्र वेगळा आणि नवा नवा वाटू लागतो.

हात तुझा हातात अन् धुंद ही हवा ।
रोजचाच चंद्र आज भासतो नवा नवा ।।ध्रु।।

रोजचेच हे वारे, रोजचेच तारे ।
भासते परि नवीन विश्व आज सारे ।
ही किमया स्पर्शाची भारिते जिवा ।।१।।

या हळव्या पाण्यावर मोहरल्या छाया ।
मोहरले हृदय तसे मोहरली काया ।
चांदण्यात थरथरतो मधुर गारवा ।।२।।

जन्म जन्म दुर्मिळ हा क्षण असला येतो ।
स्वप्‍नांच्या वाटेने चांदण्यात नेतो ।
बिलगताच जाईचा उमलतो थवा ।।३।।

...... आणि त्या सुखाचा उपभोग घेता घेता..

क्षणभर मिटले डोळे, सुख न मला साहे ।
विरघळून चंद्र आज रक्तातून वाहे ।
आज फुले प्राणातून केशरी दिवा ।।४।।
रोजचाच चंद्र आज भासतो नवा नवा ।।


फक्त हातात हात घेऊन एकमेकांच्या जवळ राहण्यात सर्वच प्रेमिकांचे समाधान होत नाही. ते एक एक पाऊल पुढे जाण्यासाठी आतुर झालेले असतात. अशी एक अधीर झालेली प्रेमिका म्हणते,

शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलतो झुला ।
थंड या हवेत, घेऊन कवेत, साजणा झुलव मला ।
साजणा रे मोहना रे ऐक ना रे, तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी,
सगे सोयरे मी सांडिले पाटी ।।

मोहन मधुर राती, भराला येऊ दे प्रीती ।
प्रीतीची हीच ना रीती, कशाला कुणाची भीती ।
झाडामागे चांद हा वरती आला, ये ना ये ना जीव आतुर झाला।
मी भुलावे, स्वैर व्हावे, गीत गावे ।।

साजणाने तिला प्रतिसाद दिल्यावर मग तर काय विचारता? आता ही चांदरात मनात केवढा कल्लोळ माजवणार आहे अशा विचाराने ती म्हणते,

चांदण्यात फिरताना माझा धरलास हात ।
सखया रे आवर ही सावर ही चांदरात ॥धृ.॥

निजलेल्या गावातून आले मी एकटीच ।
दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच ।
या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात ॥१॥

सांग कशी तुजविणाच पार करु पुनवपूर ।
तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर ।
श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात ॥२॥

जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून ।
पण माझी तुळस तिथे गेली हिरमसून ।
तुझिया नयनात चंद्र, माझ्या हृदयी प्रभात ॥३॥


तर एका नाट्यगीतामधला नायक असे उद्गार काढतो,

चांद माझा हा हासरा, नाचवी कसा प्रेमसागरा, प्रीतलहरी ये भरा।।
गुण कनकाचा नवकोंदणी गे, शोभसी सखे तू हिरा ।।
प्रेमाचे रंग अनेक आहेत. एकमेकांच्या प्रेमाची खात्री पटल्यानंतर ते सहजपणे समजू नये यासाठी कधी कधी लपवाछपवीचे खेळ सुरू होतात, पण ते शक्य असते का? मग..

लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा छपेल का ?
प्रीत लपवुनी लपेल का ?

जवळ मने पण दूर शरीरे, नयन लाजरे, चेहरे हसरे ।
लपविलेस तू जाणून सारे, रंग गालिचा छपेल का ?

क्षणात हसणे, क्षणात रुसणे, उन्हात पाउस, पुढे चांदणे
हे प्रणयाचे देणे-घेणे, घडल्यावाचुन चुकेल का ?

..... या खेळात सुध्दा चंद्र असा येतो ...

पुरे बहाणे गंभिर होणे, चोरा, तुझिया मनी चांदणे ।
चोरहि जाणे, चंद्रहि जाणे, केली चोरी छपेल का ?
प्रीत लपवुनी लपेल कां?

चंद्राच्या साक्षीने सगळे होत असते, तो सुध्दा लपून छपून ते पहात असतो, शिवाय प्रेमिकांच्या मनातही चांदणे फुललेले अलते, त्यामुळे ते गुपित उघड होणारच. अशा अवस्थेत कोणी सावधगिरीचा इशारा देते.

हसले मनी चांदणे, जपुनि टाक पाउल साजणी, नादतील पैंजणे ।।

बोचतील ग, फुलं जाइची तुझी कोमला काय ।
चांदण्यातही सौंदर्याने पोळतील ना पाय ?

पानांच्या जाळीत लपोनी चंद्र पाहतो गडे ।
सांग कुणाच्या भेटीसाठी जीव सारखा उडे ।

कुजबुजुनी कानात सांगतो मधुप, नको ग रुसू ।
लाजलाजर्‍या कळ्याफुलांना खुद्‌कन्‌ आलं हसू ।

हो जरा, बघा की वरी, कळू द्या तरी, उमटु द्या वाणी ।
का आढेवेढे उगाच, सांगा, काय लाभले राणी ?

का ग अशा पाठीस लागता मिळुनी सार्‍या जणी ?
आज लाभला मला माझिया सर्वस्वाचा धनी ।।

किति, किति ग भाग्याची, भलतीच ओढ ही कामसुंदराची ।
नव्हे ग श्यामसुंदराची ।।


नव्या संसाराची चित्रे कल्पनेमध्ये रंगवतांना एक युवती म्हणते,

लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची ।।ध्रु।।

सौख्यात वाढलेली, प्रेमात नाहलेली ।
कळिकळि फुलून ही चढते, मंडपी वेल मायेची ।।१।।

संपताच भातुकली, चिमुकली ती बाहुली ।
आली वयात खुदुखुदू हसते, होऊनी नवरी लग्नाची ।।२।।

हे माहेर , सासर ते, ही काशी , रामेश्वर ते ।
उजळिते कळस दो घरचे, चंद्रिका पूर्ण चंद्राची ।।३।।

गीतकार पी. सावळाराम, संगीतकार वसंत प्रभू आणि गायिका लता मंगेशकर या त्रिकूटाने अनेक अतीशय गोड गाणी दिली आहेत. त्यांच्या या अजरामर झालेल्या गीतातसुध्दा शेवटी चंद्र आलाच. ल या अक्षराने सुरू होणारी मराठी गाणी कमी आहेत, पण हे अक्षर गाण्याच्या शेवटी खूप वेळा येते. त्यामुळे भेंड्यांच्या कोणत्याही खेळात हे गाणे हटकून येतेच.

रोजचाच चंद्र प्रेमिकांना नवा नवा वाटतो हे वर आलेलेच आहे. दुसरा एक प्रेमी आपल्या सखीला असेच सांगतो आणि अर्थातच तीही त्याला सुरेख प्रतिसाद देते.

नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी ।
मनी नवीन भावना, नवेच स्वप्न लोचनी ।।

अनादि चंद्र अंबरी, अनादि धुंद यामिनी ।
यौवनात तू नवी मदीय प्रीत-स्वामिनी ।
घर न प्रीतिकुंज हा, बैस ये सुहासिनी।।

दूर बाल्य राहिले, दूर राहिल्या सखी ।
बोलण्या कुणासवे सूर दाटले मुखी ।
अननुभूत माधुरी आज गीत गायनी ।।

अनादि चंद्र अंबरी, अनादि धुंद यामिनी ।
यौवनात तू नवी मदीय प्रीत-स्वामिनी ।
घर न प्रीतकुंज हा बैस ये सुहासिनी ।।

कोण बाइ बोलले वाणि ही प्रियंवदा ।
या मनात नांदते तुझीच प्रीतसंपदा ।
कशास वेगळेपणा जवळ ये विलासिनी ।।


मुंबईचा जावई या चित्रपटातली लग्न होऊन सासरी आलेली एक लाजरी बुजरी नववधु आधी लहानशा घरातल्या नातेवाईकांच्या बुजबुजाटाने बावरून गेलेली असते. त्या जोडप्याला एकांत मिळावा म्हणून एकदा घरातली इतर सारी मंडळी बाहेर जातात. ऑफीसमधून घरी येणार असलेल्या पतीची वाट पहात असतांना ती विचार करते,

कशी करू स्वागता, एकांताचा आरंभ कैसा, असते कशी सांगता?

कशी हसू मी, कैसी बोलू ?
किती गतीने कैसी चालू ?
धीटपणाने मिठी घालु का, कवळू तुज नाथा ?

फुलते कळि की फुलवी वारा ?
चंद्र हसवि की हसवी तारा ?
कुठले आधी कुठले नंतर, येई ना सांगता ।।

कुणी न पुढती कुणी न पाठी ।
घरात आहे मीच एकटी ।
प्रथमदर्शनी बोलायाचा, भाव तरी कोणता ?



चंद्राचा उल्लेख असलेली अशी किती प्रेमगीते सांगावीत?



. . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)