Monday, February 08, 2010

पंपपुराण - भाग ३


आमच्या घराजवळच एक सायकलचे दुकान होते; म्हणजे सायकली विकण्याचे नव्हे, त्या तासागणिक भाड्याने देण्याचे. तिथे काम करणारी मुले पंपाने सायकलींच्या चांकांमध्ये हवा भरतांना दिसायची. स्टोव्हची आग प्रखर करणे आणि सायकलची चाके टणक बनवणे हे त्या दोन कृतींचे अगदी वेगवेगळे उपयोग आहेत. पण वातावरणामधील हवेला एका बंदिस्त जागेत कोंबून तिचा दाब वाढवणे हे मात्र या दोन्हीं पंपांचे समान उद्दिष्ट असते. त्यामुळे त्यांची रचना आणि कार्यपद्धती या दोन्हींमध्ये खूप साम्य आहे. स्टोव्हचा पंप जेमतेम बोटभर असतो आणि तो सुध्दा टांकीच्या आंत घुसवून ठेवलेला असल्यामुळे त्याचे बारके टोक तेवढे बाहेरून दिसते. त्याला चिमटीत पकडून तो पंप मारायचा असतो. सायकलचा पंप चांगला हांतभर लांब आणि मनगटाएवढा रुंद असतो, शिवाय त्याला रबराच्या नळीचे दोन हात लांब शेपूट जोडलेले असते. त्या पंपाच्या स्टँडवर दोन्ही पाय भक्कमपणे रोवून उभे राहिल्यावर दोन्ही हातांनी त्या पंपाचा दांडा वर खाली करून हवा भरायची असते. ते काम करतांना अंगाला घाम फुटतो.

स्टोव्हचा पंप आडवा असतो आणि सायकलीच्या चांकांत म्हणजे तिच्या टायरच्या आंतील ट्यूबमध्ये हवा भरणारा पंप उभा धरून चालवतात एवढा फरक सोडला तर सिलिंडर, पिस्टन, वॉशर वगैरे त्याचे भाग स्टोव्हच्या पंपासारखेच पण मोठ्या आकाराचे असतात. चांकात भरलेली हवा पंपात परत येऊ नये यासाठी आवश्यक असलेली झडप सायकलच्या चाकाच्या ट्यूबलाच जोडलेली असते. ट्यूबमध्ये हवा भरण्यासाठी पंपाची नळी त्या व्हॉल्व्हला जोडतात. पंपाचा दांडा वर ओढतांना आजूबाजूची हवा सिलिंडरमध्ये शिरते आणि तो खाली दाबला की त्या हवेचा दाब वाढतो आणि व्हॉल्व्ह उघडून ती हवा सायकलच्या ट्यूबमध्ये भरली जाते. हवा भरून पंपाची नळी बाजूला केल्यानंतर तो व्हॉल्व्ह आंतील हवेला एकदम बाहेर जाऊ देत नाही. पण सायकलीचा उपयोग करतांना ती सूक्ष्म प्रमाणात हळू हळू लीक होते आणि तिचा दाब कमी होत जातो. त्यामुळे चांकाचे टायर मऊ आणि चपटे होऊ लागतात, ते आपल्याला जाणवते. ट्यूबला एकादे छिद्र पडले किंवा झिजून ती फाटली तर त्यातून आतली सगळी हवा फुसकन बाहेर पडते. त्या नंतर ट्यूबचे पंक्चर काढून किंवा ट्यूबच बदलून तिच्यात पंपाने हवा भरून तिला फुगवतात.

स्वयंचलित वाहनांच्या चांकामध्ये हवा भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर वेगळे यंत्र बसवलेले असते. त्याला मात्र काँप्रेसर म्हणतात. यातही एक गंमत आहे. बंदिस्त जागेतल्या हवेचा दाब वाढवण्यासाठी त्यात आणखी हवेला घुसवणारे यंत्र काँप्रेसर म्हणून ओळखले जाते, पण त्याच जागेत आधीपासून असलेली हवा बाहेर काढून तिथे निर्वात पोकळी पाहिजे असेल तर त्यासाठी वेगळे यंत्र लागते आणि त्याला व्ह्यॅक्यूम पंप असे संबोधतात. याचा अर्थ काँप्रेसर हा देखील पंपाचाच एक उपप्रकार आहे असे म्हणता येईल. हे पंपपुराण संपल्यानंतर त्यांचाही विचार करता येईल.

मी अगदी लहान असतांनासुध्दा आमच्या गांवाबाहेर एक पेट्रोल पंपसुध्दा होता; म्हणजे आम्ही त्याबद्दल ऐकले होते. पूर्वी संस्थान असतांना आपल्या गाड्यांना व्यवस्थित तेल पाणी मिळावे या उद्देशाने संस्थानिकांनी कदाचित तो प्रायोजित केला असावा. पण संस्थानांचे विलीनीकरण झाल्यानंतर गांवात खाजगी मालकीच्या फारशा मोटारगाड्या उरल्या नव्हत्या आणि बाहेरगांवाहून मोटारीत बसून येणा-यांची संख्याही नगण्यच असायची. मालवाहतूकीसाठी कधी तरी येणा-या ट्रकगाड्या आणि प्रवाशांची वाहतूक करणा-या सर्व्हिसच्या गाड्या याच तिथे जात असतील किंवा कदाचित तो बंदच पडला असेल. तिकडे फिरकण्याचे मला कांहीच कारण किंवा निमित्य मिळाले नसावे. त्यामुळे तो ऐतिहासिक पंप पाहिल्याचे आठवत नाही. पण गांवाची प्रगती होत गेली, नवनवे चांगले रस्ते तयार झाले, तसतशी वाहतूक वाढत गेली आणि माझे शालेय शिक्षण संपेपर्यंत गांवाच्या वेशीच्या आंतच एक नवा पेट्रोल पंप उभा राहिला. तो बांधला जात असतांना पासून जाता येतांना दिसत असल्यामुळे जमीनीखाली मोठमोठ्या टांक्या बांधल्या आहेत आणि टँकरमधून आलेले तेल त्यात साठवले जाते एवढे समजले होते आणि रबराच्या एका नळीतून ते मोटारीच्या टँकमध्ये भरतात हे दिसत होते. ते भरतांना किती तेल भरले आहे हे दाखवणारा कांटा फिरतांना पाहतांना मजा वाटायची. पण यात 'पंप' कशाला म्हणायचे? हे कांही त्या वेळी समजले नाही. जमीनीखाली असलेले पेट्रोल त्या होजमधून वर कसे येऊ शकते असा भौतिकशास्त्रातला प्रश्नही त्या वयात मला त्रास द्यायला मनात आला नाही.

Sunday, February 07, 2010

पंपपुराण - भाग २


आमच्या घरात असलेला दुसरा पंप हा घरातल्या प्रायमस स्टोव्हचा एक भाग होता. तो समजून घेण्याआधी या स्टोव्हची थोडी माहिती द्यायला हवी. पन्नास साठ वर्षांपूर्वीच्या त्या काळातल्या ग्रामीण भागात घरोघरी खरोखरच फक्त मातीच्या चुलीच असत आणि जळाऊ लाकडे हे मुख्य इंधन असे. त्याखेरीज शेणाच्या गोव-या, सुकलेले गवत, कागदाचे चिटोरे, कापडाच्या चिंध्या, लाकडाचा भुसा, नारळाची करवंटी, भुईमुगाच्या शेंगांची फोलपटे यासारखे जे कांही ज्वलनशील पदार्थ घरात असतील ते सारे बंबातल्या किंवा चुलीतल्या अग्नीनारायणाला स्वाहा केले जात असत. पण चूल पेटवायला बराच वेळ लागत असल्यामुळे तांतडीच्या कामासाठी किंवा फक्त थोडा वेळ काम असेल तर त्यासाठी प्रायमस स्टोव्हचा उपयोग केला जाई. चूल, शेगडी वगैरे साधने स्वयंपाकघरातल्या धुराड्याखाली एका ठराविक जागी जिथे जमीनीवर मांडलेली असतात त्या जागीच त्यांचा उपयोग करता येतो, पण हा स्टोव्ह उचलून कोठेही सहज नेता येत असल्यामुळे घराच्या कुठल्याही भागात त्याचा उपयोग करता येत असे. तसेच गरज पडल्यास चूल आणि शेगडी यांना पूरक म्हणूनही त्याचा उपयोग होत असे. असे हे एक सर्वगुणसंपन्न साधन असायचे. आज आमच्या जीवनाचा अत्यावश्यक अंग बनलेल्या गॅस आणि विजेवर चालणा-या शेगड्या त्या काळात आम्हाला ऐकून सुध्दा ठाऊक नव्हत्या.

या प्रायमस स्टोव्हमध्ये वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे एक पितळेची टांकी असते. तिच्यात रॉकेल भरायचे. त्या टाकीच्या मधोमध असलेल्या उभ्या नळीतून ते वर येऊन तिच्या तोंडाशी बसवलेल्या नॉझल्समधून त्याचा फवारा पसरतो. त्यापूर्वीच त्या रॉकेलचे बाष्पीभवन झालेले असल्यामुळे तो फवारा लगेच पेट घेतो आणि रॉकेलचे पूर्ण ज्वलन होऊन तीव्र ऊष्णता देणा-या ज्वाला त्यातून निघतात. टांकीला जोडलेल्या तीन उभ्या सळ्यांवर एक तबकडी ठेवलेली असते. त्या तबकडीवर स्वयंपाकाचे भांडे ठेवले जाते. टांकीतले रॉकेल नळीतून वर चढण्यासाठी टांकीतल्या रॉकेलवर हवेचा दाब दिला जातो. हवेचा दाब जितका जास्त असेल तितक्या जास्त वेगाने रॉकेल वर ढकलले जाते आणि त्या प्रमाणात ती ज्वाला प्रखर होते.

टांकीतल्या हवेचा दाब वाढवण्यासाठी पंपाचा उपयोग केला जातो. या पंपातसुध्दा एक लहानसा सिलिंडर (नळकांडे) आणि त्यात मागे पुढे सरकणारा पिस्टन (दट्ट्या) असतो. त्या दट्ट्याच्या तोंडाशी चामड्याचा खोलगट आकाराचा वायसर (वॉशर) बसवलेला असतो आणि सिलिंडरच्या दुस-या टोकाला फक्त आंतल्या बाजूला उघडणारा व्हॉल्व्ह असतो. पिस्टन बाहेर ओढतांना बाहेरील हवा वायसरच्या बाहेरच्या बाजूने सिलिंडरमध्ये खेचली जाते आणि पिस्टन पुढे ढकलतांना खोलगट आकाराचा वॉशर सिलिंडरला घट्ट दाबला जातो. त्यामुळे आंतली हवा बाहेर पडू शकत नाही आणि तिचा दाब वाढत जातो. जेंव्हा तो टांकीमधील हवेच्या दाबापेक्षा जास्त होतो त्यानंतर व्हॉल्ह उघडून जास्त दाबाची हवा टांकीत जाऊन तेथील हवेचा दाब अधिक वाढवते. अशा प्रकारे हवेचा दाब वाढवून स्टोव्हची आंच वाढवली जाते. स्टोव्हची आंच कमी करायची असेल तर टांकीमधील हवेचा दाब कमी करण्यासाठी एक चावी ठेवलेली असते. ती थोडी सैल करताच आंतली थोडी हवा बाहेर पडून तिचा दाब कमी होतो. त्यानंतर ती लगेच आवळली नाही तर सगळा दाब नाहीसा होऊन स्टोव्ह बंद पडतो. काम संपल्यानंतर या चावीचा उपयोग करूनच स्टोव्ह विझवला जातो.

स्टोव्हमधील रॉकेल जळून कमी होत जाते तसतशी टांकीतली रिकामी जागा वाढत जाते आणि त्यामुळे तिच्यात असलेल्या हवेचा दाब कमी होतो. व्हॉल्व्ह आणि चावीमधून सूक्ष्म प्रमाणात हवा बाहेर पडूनसुध्दा तिचा दाब कमी होत असतो. त्यामुळे जळत असलेल्या स्टोव्हला अधून मधून पंप मारावाच लागतो. तसे नाही केले तर हवेचा दाब कमी झाल्यामुळे रॉकेल नळीतून वर चढणार नाही आणि स्टोव्ह विझून जाईल. हा पंप मारण्यासाठी एका हाताने स्टोव्हची टांकी घट्ट धरून ठेवावी लागते आणि दुस-या हाताने थोडा जोर लावावा लागतो. स्टोव्ह हा प्रकारच थोडा धोकादायक असल्यामुळे लहान मुलांना त्याच्या जवळ जाण्याची परवानगी नसे. या पंपाबद्दल माझ्या मनात बरेच कुतूहल असले तरी तो हाताळण्यासाठी मला बरीच वर्षे वाट पहावी लागली.

Saturday, February 06, 2010

पंपपुराण - भाग १



माझा जन्म होण्याआधीच पंप या वस्तूने आमच्या घरात प्रवेश केला होता आणि तो रोजच्या वापरात होता. त्यामुळे मला समजायला लागल्यापासून पंप हा शब्द ओळखीचा होता. आमच्या घरात दोन लहानसे पंप असायचे, पण त्यातल्या एकाचाही पाण्याशी कांही संबंध नव्हता. किंबहुना त्यांचा पाण्याशी स्पर्शसुध्दा होता कामा नये अशी काळजी घेतली जात असे.

त्या काळात चार गॅलनच्या टिनाच्या चौकोनी डब्यातून केरोसीन किंवा घासलेट घरी आणले जात असे. आमच्या घरी त्याचा उल्लेख 'राकेल' या नांवाने होत असे. एका पंपाचा उपयोग करून ते राकेल त्या डब्यातून एका उभ्या बाटलीत काढले जात असे आणि त्या बाटलीतून ते रोजच्या उपयोगासाठी वापरले जात असे. यासंबंधातल्या सगळ्या वस्तू परदेशातून आल्या तेंव्हा त्यांच्या नांवाची मराठी रूपांतरे होत गेली. 'रॉक ऑइल' चे 'राकेल' झाल्यावर खोबरेलसारखेच ते एक प्रकारचे तेल झाले. अत्यंत दर्गंधी असल्यामुळे त्याचा उपयोग मात्र फक्त जाळण्यासाठी किंवा रंगांचे डाग काढण्यासाठी होत असे. 'गॅस लाईट' चे 'घासलेट' झाले, 'बॉटल'ची बाटली झाली. 'फनेल'च्या आकाराला 'नरसाळे' हा शब्द होता, पण बोलीभाषेत त्याला आम्ही 'नाळके' म्हणत होतो. 'पंप' हा आंग्ल शब्द मात्र 'संथ', 'कंद', 'संप' यासारखा वाटत असल्यामुळे मराठी भाषेत चपखल बसला. हा शब्द परभाषेतून आला असेल असे कधी वाटलेच नाही. त्या काळात आमची घ्राणेंद्रिये जरा जास्तच संवेदनाशील असल्यामुळे आणि सुरक्षिततेचा उपाय म्हणून रॉकेलचा डबा, बाटली, पंप आणि नाळके या सगळ्या वस्तू एका वेगळ्या खोलीतल्या कपाटात बंद करून ठेवल्या जात असत. गरज पडेल तेंव्हाच त्या बाहेर काढून काम झाल्यानंतर परत त्या जागी नेऊन ठेवल्या जात.

डब्यातून केरोसीन उपसण्यासाठी लागणा-या पंपाची रचना अगदी साधी सोपी असते. एका उभ्या नळकांडीच्या तळाला एक भोक ठेवलेले असते. त्यावर एक साधी झडप ठेवलेली असे. ती एकाच बाजूने उघडली जात असल्यामुळे पंपात आलेले रॉकेल डब्यात माघारी जात नाही. त्या पंपाच्या आत एक दट्ट्या असतो. एका बारीकशा सळीच्या तळाला एक पत्र्याची चकती जोडून तो तयार केलेला असतो. चिमटीत पकडून धरण्यासाठी ती सळी वरच्या टोकाला वाकवलेली असते. पंपाच्या वरच्या बाजूला एक तोटी बसवलेली असते. पंपाने वर खेचलेले तेल या तोटीतून बाहेर पडते.

डब्यातून रॉकेल काढण्यासाठी चित्रात दाखवल्याप्रमाणे डब्याच्या शेजारी बाटली ठेऊन तिच्या तोंडावर नरसाळे बसवले जाते. डब्याच्या वरच्या बाजूच्या एका कोप-यात असलेल्या लहानशा तोंडावरील झांकण उघडून तो पंप त्यातून आत सोडला की त्या पंपाच्या नळकांडीच्या तळाशी असलेल्या भोकामधून डब्यातले तेल पंपात शिरते. हाताने दट्ट्या वर उचलल्यावर त्याला जोडलेल्या चकतीच्या वर असलेला रॉकेलचा स्तंभ वर उचलला जातो आणि तोटीमधून ते तेल नरसाळ्यात पडून बाटलीत जाते. चकती आणि नळकांडे यामधील बारीक पोकळीतून ते या वेळी हळू हळू खाली पडत असते. पण दट्ट्या झटक्यात ओढल्याने बरेचसे रॉकेल त्याच्यासोबत वर उचलून बाहेर काढता येते. तो सावकाशपणे ओढला तर मात्र सर्व रॉकेल बाजूने खाली पडून जाईल आणि नरसाळ्यात कांहीच येणार नाही. डब्यातील रॉकेलची पातळी जसजशी खाली जात जाईल तसतसे त्याचे दर स्ट्रोकमध्ये पंपातून बाहेर पडण्याचे प्रमाण कमी होत जाते.

दट्ट्या खाली ढकलतांना मात्र याच्या उलट परिस्थिती असते. तो झटक्यात खाली ढकलला तर नळकांड्यामधील रॉकेलचा त्याला विरोध होतो आणि तो मोडून काढण्यासाठी जास्त जोर लावला तर पंपाच्या दट्ट्याची सळी वाकण्याचा किंवा तिला जोडलेली चकती निसटण्याचा धोका असतो. त्यामुळे तो किंचित कमी गतीने जरा जपून खाली ढकलायचा आणि झटक्यात वर ओढायचा अशा प्रकारचे थोडे कौशल्य या कामात लागते. डब्यातून बाटलीत रॉकेल काढण्याचे काम नेहमी घरातल्या मुलांकडेच असायचे. त्यामुळे कमीत कमी सेकंदात किंवा कमीत कमी स्ट्रोक्समध्ये बाटलीभर रॉकेल कोण काढतो याची त्यांच्यात चढाओढ असायची. पण बक्षिस म्हणून हे कामच गळ्यात पडले आहे हे लक्षात आल्यावर तो मुलगा चँपियनचा इन्स्ट्रक्टर बनून लहान भावाला तयार करायच्या प्रयत्नाला लागत असे.

. . . . . . . . (क्रमशः)

Tuesday, February 02, 2010

निकष

आपल्या पुराणात एक मजेदार आणि बोधप्रद रूपककथा आहे. एक ऋषी आपल्या तपश्चर्येत मग्न असतांना एक उंदराचे पिल्लू येऊन त्याच्या अंगाखांद्यावर बागडू लागले. आता या लहानशा पिल्लाला शिक्षा तरी कशी करायची असा विचार करून त्या ऋषीने आपल्या तपोसामर्थ्याने त्याचे रूपांतर एका कन्यकेत केले. ती मुलगी वाढून वयात आली तेंव्हा कुठल्याही बापाप्रमाणे तो ऋषीसुध्दा तिच्या विवाहाच्या विचाराला लागला. जगातील सर्वश्रेष्ठ पुरुषाबरोबर तिचे लग्न लावावे असे त्याने ठरवले आणि याबाबतीत त्या मुलीच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्याने तिच्याबरोबर बोलतांना हा विषय काढला. जगातील सर्वात तेजस्वी असा सूर्यनारायण तिला कसा वाटतो असे विचारल्यावर ती उद्गारली, "पण एक काळा ढग सुध्दा त्याचे तेज झाकून टाकतो. तो कसा सर्वश्रेष्ठ असेल?"
पुढे जाऊन "त्या ढगाला एका जागी स्थिर उभेसुध्दा राहता येत नाही. वारा त्याला जिकडे नेईल तिकडे तो जातो.", "वा-याचे सुध्दा उंच पर्वतापुढे कांही चालत नाही. तो वा-याला अडवतो"
वगैरे झाल्यावर "मग नगाधीश तुला चालेल कां?" या प्रश्नावर उत्तर आले, "त्याच्या अंगावर छिद्रे पाडून त्या बिळात उंदीर राहतात, त्यांना देखील तो पर्वत काही करू शकत नाही." ही गोष्ट समोर आली. उंदराचा उल्लेख करतांना ती मुलगी छानशी लाजली. हे पाहून त्या ऋषीने तिला पुन्हा तिचे मूळ रूप परत दिले आणि मूषकराजाबरोबर विवाह करून ती उंदरी त्याच्या बिळात सुखाने रहायला गेली."

श्रेष्ठता आणि क्षुद्रपणा ठरवतांना कसे सापेक्ष निकष लावले जातात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. सूर्याची तर दोन्ही बाजूंनी पंचाईत आहे. ढगाआड जाऊन तो निष्प्रभ होतो आणि त्याचे निरभ्र आभाळात तळपणारे ऊनही सहन होत नाही. "तुझे मै चाँद कहता था मगर उसमे भी दाग है।" असे म्हणून चंद्राला नाकारून झाल्यावर "तुझे सूरज मै कहता था मगर उसमेंभी आग है।" असे म्हणून शायर त्याचाही निकाल लावतो. राम आणि कृष्ण या महाविष्णूच्या अवतारांनासुध्दा त्यांच्या अवताराच्या काळातच टीकेला सामोरी जावे लागले होते. "रामाने आपल्या कर्तव्यात कसूर केली" असा आक्षेप एका धोब्याने घेतला आणि शिशुपालाने श्रीकृष्णाला शंभर दूषणे दिली होती. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या कथांमधील प्रसंगांचा आजकाल काय काय अर्थ लावला जात आहे हे पाहिल्यावर कदाचित "संभवामि युगे युगे।" या कृष्णाने दिलेल्या आश्वासनावर त्याला पुनर्विचार करावेसे वाटेल.

देवादिकांची ही कथा असली तर मनुष्य म्हणजे सद्गुण आणि दुर्गुण, क्षमता आणि न्यूनता यांचे गाठेडेच असणार. त्यातही अर्थातच वर लिहिल्याप्रमाणे चांगले वाईट ठरवण्याचे माझे निकष इतरांपेक्षा वेगळे असणारच. एकाद्या माणसाबद्दल लिहितांना त्याच्यातला मला न आवडलेला भाग सोडून द्यायचा, मला खुपलेल्या भागाबद्दल फार तर एकादा चिमटा काढायचा, पण कडाडून हल्ला करायचा नाही असे धोरण या ब्लॉगवर लिहितांना मी ठरवले आहे. वाईट साईट लिहिल्यामुळे उगाच कुणाच्या तरी भावना दुखवल्या जायचा धोका कशाला पत्करायचा? कोणाबद्दल चांगले लिहितांना मात्र "वचने किम् दरिद्रता?" या सुभाषितानुसार त्याला जरासे झुकते माप दिले. पण अप्रस्तुत आणि अतीशयोक्त असे कांही लिहिले असेल असे मला वाटत नाही.

माझ्या आयुष्यात जी माणसे मला भेटली त्यातल्या कांही सर्वसामान्य माणसांमधले असामान्य गुण त्यांच्याबरोबर दीर्घकाळ घडलेव्या स्नेहसंबंधातून माझ्या नजरेला पडत गेले, तर कांही महान लोकांबरोबर घडलेल्या पांच दहा मिनिटांच्या भेटीतच त्यांच्यामध्ये असलेल्या दिव्यत्वाची प्रचीती आली. अशा कांही निवडक माणसांची व्यक्तीचित्रे मी 'तेथे कर माझे जुळती' या मालिकेत काढण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी अनेक लोकांबद्दल पुढे लिहिणार आहे. आभाळाएवढी उंची असलेल्या या माणसांचे पायसुध्दा जमीनीलाच टेकलेले आहेत हे मला जाणवले असले तरी ते मुद्दम नमूद करण्याचे कारण नव्हते. त्याखेरीज मला भावलेल्या कांही सांस्कृतिक कार्यक्रमांबद्दल लिहितांना कलाविश्वातल्या संबंधित लोकांचा परिचय करून दिला तेव्हा त्यांच्याबद्दल चार चांगले शब्द लिहिले आहेत. यातल्या कोणीसुध्दा मला ते करायला सांगितले नाही, कारण कधीकाळी मी कुठेतरी कांही तरी लिहिणार आहे हे मला स्वतःलाच माहीत नव्हते. त्यासाठी त्यांनी मला कांही लालूच दाखवायचा तर प्रश्नच नाही.

कोणाबद्दल चार चांगले शब्द लिहिल्यामुळे दुसरेच कोणी माझ्यावर नाराज होईल असे मला चुकूनही वाटले नव्हते. पण हा गैरसमजसुध्दा आता दूर झाला. बक्षिससमारंभाला आलेल्या प्रमुख पाहुण्यांबद्दल आदरच व्यक्त करायची प्रथा आहे. त्याची ओळख करून देतांना त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तीमत्वाची आणि कामगिरीची आठवण काढणे या प्रथेला धरून आहे. एका हरहुन्नरी व्यक्तीबद्दल लिहितांना आजच्या काळातली अशी दुसरी अष्टपैलू व्यक्ती माझ्या पाहण्यात किंवा ऐकण्यात आली नाही असे मी लिहिले आणि ते खरेच आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करता करता तंत्रज्ञानाचे व्यवस्थापन केले आणि त्या निमित्याने व्यवस्थापनकौशल्य आणि अर्थशास्त्र या विषयांचे बिगरीचे धडे घेतले. एक श्रोता आणि प्रेक्षक या नात्याने रंगमंच आणि पडद्याच्या आजूबाजूला घुटमळत राहिलो. त्यामुळे या क्षेत्रांमधील नामवंतांची नांवे मला परिचयाची असली तरी ती वेगवेगळी आहेत. या चारही क्षेत्रांत वावरणारी दुसरी व्यक्ती मला तरी भेटलेली नाही.

त्या व्यक्तीला मी कांही 'थोर' किंवा 'महान' वगैरे विशेषणे लावली नव्हती किंवा 'सर्वश्रेष्ठ' म्हंटले नव्हते. तरीसुध्दा भूतकाळातल्या कांही महात्म्यांचे दाखले देऊन त्यांना तुम्ही कसे ओळखणार? त्यांनी तुमच्यापुढे बक्षिसाचा तुकडा कुठे टाकला होता? असे प्रश्न उपस्थित करून माझी जागा मला दाखवून दिली. देशभक्ती, नेतृत्वक्षमता, त्याग, निष्ठा वगैरे महान गुण आणि अनेक विषयांचा सखोल अभ्यास करून एकाच वेळी त्यात पारंगत होणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्यांचे मोल ठरवण्याचे निकष वेगवेगळे असतात. त्यातही ज्या महात्म्यांना पूजेच्या देव्हा-यात स्थान मिळाले आहे त्यांची तुलना मर्त्य मानवाबरोबर करता येत नाही कारण आपण सर्वसामान्य लोक त्यांच्याबद्दल त्रयस्थपणे विचार करू शकत नाही.

"पुस्तके काय कोणीही लिहील आणि आजकाल कुणाचाही सन्मान आणि सत्कार केला जातो, तेंव्हा त्याला काही अर्थ नाही" असे प्रतिपादन केले गेले. कुठलेही अभ्यासपूर्ण पुस्तक न वाचताच ते लिहिणारा लेखक विद्वान नसेलच, त्याने केवळ उचलेगिरी केली असणार असे ठरवून टाकायचे आणि अनेक ठिकाणी त्याला मिळालेला सारा मानमरातब त्याने वशीलेबाजी आणि कारस्थाने करून प्राप्त केला असणार असे गृहीत धरायचे झाले तर मग कोणाचा चांगलेपणा ठरवायचा तरी कसा? त्यासाठी कोणता निकष वापरायचा? चांगली माणसे फक्त इतिहासकाळातच होऊन गेली का? देवाने आपला चांगली माणसे तयार करायचा कारखाना आता बंद करून ठेवला आहे का? असे प्रश्न पडतात. 'जुने ते सोने' ही म्हण ऐकली होती, पण 'फक्त जुने तेवढेच सोने' हा निकष पटणारा नाही.

Friday, January 29, 2010

कारवाँ बढता गया ।


सुमारे एक वर्षापूर्वी मी 'कारवाँ बनता गया' हा लेख या ठिकाणी लिहिला होता. तेंव्हा याच्या फॉलोअर्सची संख्या फक्त पाचच होती. तरीही मला त्याचे नवल वाटल्यामुळे मी त्यांना 'थवा' असे नांव देऊन करून खाली दिलेला प्रसिध्द उर्दू शेर मराठीत स्वैर रूपांतर करून दिला होता.

जात होतो एकटा मी मार्ग शोधूनी नवा ।
मागुनी पांथस्थ आले जाहला त्यांचा थवा ।।

त्या लेखातला महत्वाचा भाग नवीन वाचकांच्या सोयीसाठी खाली उद्धृत केला आहे.

"खरे तर मी चौफेर लिहीत आलो आहे. मी एकादा वेगळा पंथ काढला नव्हता आणि त्यात सामील व्हायचे आवाहनही कधीच कोणाला केले नव्हते. त्यामुळे माझा अनुयायी म्हणून एक नांव माझ्या ब्लॉगवर दिसू लागल्यावर मला त्याचे थोडे आश्चर्यच वाटले. त्यांची संख्या वाढत वाढत आता पांचावर गेली आहे. यापूर्वी आंतर्जालावर भटकत असतांना ब्लॉगधारकांना आवडलेल्या इतर ब्लॉग्जची यादी आणि आंतर्जालावरून तिकडे जाणारे दुवे कांही ब्लॉग्जवर दिलेले मी पाहिले होते. कदाचित त्यांची लेखकमंडळी आपापल्या मित्रांच्या ब्लॉगची नांवे एकमेकांच्या अनुदिन्यांवर घालून ते चटकन पहाण्याचा सोयीचा मार्ग तयार करून ठेवत असतील किंवा आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचा ओघ आपल्या मित्रांकडे वळवीत असतील अशी माझी कल्पना होती. माझ्या ब्लॉगचे अनुयायी झालेल्या मंडळींची मात्र माझी साधी तोंडओळखसुध्दा झालेली नाही आणि त्यांनी कधी माझ्या लिखाणावर प्रतिसाद दिले असले तरी ते माझ्या ध्यानात राहिलेले नाहीत. चांगला लक्षात रहावा एवढा संवाद नक्कीच कोणाबरोबर साधलेला नाही. त्यातील एका अनुयायाने आपले नांवसुध्दा माझ्यापासून गुप्त राहील अशी व्यवस्था करून ठेवली आहे. माझे (सुध्दा) कांही अनुयायीगण आहेत ही भावना जरी अत्यंत उत्साहवर्धक असली तरी ते कोण आहेत आणि कसल्या बाबतीत ते माझ्या कोणत्या मार्गाचे अनुसरण करतात हे समजले तर मला जास्तच आनंद होईल. माझ्याकडून त्यांना कांही अपेक्षा असतील आणि त्यांनी त्या व्यक्त केल्या तर मला त्या समजू शकतील. हा भाग वाचल्यानंतर ते प्रतिसाद पाठवतील अशी अपेक्षा आहे."

'फॉलोअर' या इंग्रजी शब्दाला 'अनुयायी' असा प्रतिशब्द असला तरी या बाबतीत मला तो तेवढा सयुक्तिक वाटला नाही. त्यामुळे मी त्यांना माझे 'पाठीराखे' असे म्हणायचे ठरवले. या पाठीराख्यांची संख्या वाढून आता चाळीसवर पोचली आहे. यात कोण कधी आले आणि कोण किती दिवस राहून (कंटाळून) सोडून गेले वगैरेचा हिशोब मी कधी ठेवला नाही. तशी माहिती सोयीस्कररीत्या उपलब्धही नाही. सुरुवातीला मी त्या सर्वांच्या संकेतस्थळावर जाऊन ती पहायचे ठरवले होते. पण वेळेअभावी ते जमलेच नाही याबद्दल क्षमायाचना करतो. या वर्षी पुन्हा प्रयत्न करावा असा विचार आहे.

मी वर दिलेल्या उता-यातले बहुतेक मुद्दे अजून अनुत्तरितच आहेत. नरेंद्र गोळे माझ्या ओळखीचे आहेत आणि देवदत्तची नुकतीच ओळख झाली. इतर अडतीस लोकांबद्दल कांहीच माहिती नाही, पण जाणून घेण्याची उत्सुकता आहे. त्यांनी पुढे येऊन खाली दिलेल्या प्रश्नांपैकी योग्य वाटतील तेवढी उत्तरे द्यावीत अशी कळकळीची विनंती आहे.
१. टोपणनांव दिले असल्यास खरे नांव काय आहे?
२. माझ्या ब्लॉगवरील कोणता भाग आवडतो आणि कोणता आवडत नाही?
३. आणखी काय वाचायला किंवा पहायला आवडेल?

Thursday, January 28, 2010

ब्लॉग माझा स्पर्धा (उत्तरार्ध)


प्रमुख पाहुणे श्री. अच्युत गोडबोले यांच्याबद्दल काय काय सांगावे? आजच्या युगातला एक चमत्कार वाटावा इतके अनेकविध पैलू त्यांच्या व्यक्तीमत्वाला आहेत. केमिकल इंजिनियरिंगची पदवी घेऊन सुरुवात केल्यानंतर पुढे व्यावसायिक सांधे बदलत ते आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त संगणकतज्ज्ञ झाले. आज आघाडीवर असलेल्या अनेक कंपन्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळून त्यांनी आपल्या कारकीर्दीत त्या कंपन्यांना चांगले नांवारूपाला आणले. संगणक आणि व्यवस्थापन या दोन्ही क्षेत्रातील सर्वोच्च स्तरावरील तज्ज्ञांमध्ये त्यांची गणना होते. त्यासाठी अनेक पुरस्कार देऊन त्यांना गौरवलेले आहे. त्यांनी तंत्रज्ञानावर अनेक इंग्रजी पुस्तके लिहिली आहेतच. त्या पुस्तकांना आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान जगतात महत्व प्राप्त झाले आहे. इतर अनेक भाषांमध्ये त्यांची भाषांतरे झाली आहेत. मराठी भाषेत त्यांनी लिहिलेली संगणकयुग, बोर्डरूम, नादवेध, किमयागार, झपूर्झा आणि अर्थात ही पुस्तके सुध्दा अत्यंत लोकप्रिय झाली आहेत. ती अनुक्रमे संगणक, व्यवस्थापन, संगीत, विज्ञान, वाङ्मय आणि अर्थशास्त्र अशा वेगवेगळ्या विषयांवर आहेत. संगीताच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना पं. कुमार गंधर्व पुरस्कार स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या हस्ते मिळाला आहे. इतक्या वेगवेगळ्या विषयांचा सखोल अभ्यास करून त्यात इतकी उंची गाठलेली दुसरी कोणती व्यक्ती माझ्या पहाण्यातच काय, ऐकण्यातही नाही. या अष्टपैलुत्वासाठीच त्यांना इंद्रधनु पुरस्कार मिळाला आहे. याखेरीज एक सामाजिक जाणीव बाळगणारी आणि समाजकार्यासाठी तळमळीने काम करणारी व्यक्ती असा त्यांचा नांवलौकिक आहे. ऑटिस्टिक मुलांसाठी त्यांनी आशियाना ही संस्था चालवली आहेच, रानावनात राहणा-या आदिवासी भिल्ल समाजाच्या सर्वांगीण विकासासाठीदेखील त्यांनी कार्य केले आहे.

असे खास पाहुणे आम्हाला प्रमाणपत्र देण्यासाठी येणार असल्याचे समजल्यामुळेच आम्हाला आनंद झाला होता. त्यातून ते निवांतपणे आमच्याबरोबर बसून गप्पागोष्टी करणार आहेत हे ऐकून तर त्याला पारावार उरला नाही. कांही मोठी माणसे बडी प्रस्थे झालेली असतात. मोठेपणाबरोबरच आढ्यता आणि आत्मप्रौढी हे गुण येऊन त्यांना चिकटतात. इतरांना तुच्छ लेखणे, त्यांनी सतत आपल्यापुढे लांगूलचालन करत रहावे असे वाटणे यासारख्या संवयी त्यांना लागल्या तर मग त्यांच्याशी संवाद साधणे कठीण होऊन जाते. पूर्वी असे कांही अनुभव आलेले असल्यामुळे अच्युत गोडबोले कसे त्वागतील आणि आपण यांच्याशी काय बोलायचे असे प्रश्न मनात येत होते आणि थोडे बिचकत बिचकतच आम्ही त्यांच्या सभोवती गोळा झालो होतो. इतरांचे मला नक्की सांगता येत नसले तरी बहुधा तसेच झाले असावे असे मला वाटले. पण गोडबोले यांना त्याचीही अपेक्षा असावी आणि संवय झाली असणार. त्यांनीच पुढाकार घेतला आणि अत्यंत कुशलतेने सुरुवात करून संवादाचे आभाळ मोकळे करून दिले. या स्पर्धेबद्दल थोडक्यात सांगून झाल्यानंतर क्रमाक्रमाने आमची माहिती विचारून घेतांनाच नर्म विनोद करीत त्यात ते आपला रंग भरत गेले.

कुठून तरी संवादाची गाडी पुण्यावर आली. पुणेरी पाट्यांना तर आता महाजालावर अढळ स्थान मिळाले आहे. पुण्यातल्या रस्त्यावर भेटलेल्या लोकांचे दोन मजेदार किस्से गोडबोल्यांनी सांगितले. एका नवख्या माणसाने आपल्या हाताने समोर तर्जनी दाखवत "शनिवारवाड्याकडे हे असेच समोर जायचे आहे ना?" असे विचारताच पुणेकर उद्गारला, "असंच कांही नाही. तुम्ही हात खाली करून गेलात तरीसुध्दा चालेल." दुसरा एक पुणेकर कर्वे रोडवर रस्त्याच्या मधोमध सायकल चालवत चालला होता. मागून येत असलेल्या ऑटोरिक्शावाल्याने अनेक वेळा भोंपू वाजवूनही तो बाजूला व्हायला तयार होईना. अखेर त्याने मोठ्याने हांक मारली, "अहो कर्वे" सायकलवाला थांबून म्हणाला, "माझे आडनांव कर्वे नाही." त्यावर रिक्शावाला उद्गारला, "तुम्ही हा रस्ता आपल्या बापाच्या मालकीचा असल्यासारखे चालला आहात म्हणून मला तसे वाटले." हा किस्सा निदान पन्नास वर्षांपूर्वीच्या काळातला असला पाहिजे. आजच्या कर्वे रोडवरून मिलिटरीचा रणगाडा जात असला तरी कदाचित त्याच्या दोन्ही बाजूंनी दोन रिक्शा पुढे जाऊ शकतील. त्यानंतर इतर लोकांनाही उत्साह आला आणि भारतात सरदारजीच्या किंवा इंग्लंडमध्ये आयरिश लोकांच्या नांवाने सांगितले जाणारे कांही विनोद त्यांनी पुणेकरांच्या नांवांवर खपवले. पुण्याहून आलेल्या दोन्ही पाहुण्यांनी ते खिलाडूपणाने स्वीकारले, पण मुंबईला राहणा-या एका मूळच्या अस्सल पुणेकर सदस्याला मात्र ते नापसंत पडलेले जाणवले.

एकूण तेरा जणांना प्रमाणपत्रे मिळायची होती, त्यातल्या राजकुमार जैन आणि विजयसिंह होलाम या दोघांचे प्रतिनिधी आले होते आणि मेधा सकपाळच्याकडून सुरुवातीला कोणी नव्हते, पण नंतर त्यांचे प्रतिनिधित्व करणारे आले. उरलेले दहाजण मात्र जातीने उपस्थित राहिले होते. हरिप्रसाद भालेराव तर बंगलोरहून आलेले होते. योगायोगाने त्यांचे दुसरे एक काम निघाले होते किंवा त्यांनी ते जुळवून आणले असेल. स्टार माझा तर्फे तर टीएडीए मिळणार नव्हताच. प्रत्येकाने आपापली सोय करायची होती आणि सर्वांनी ती केली होती. ब्लॉग लिहिणा-या लोकांमधले अनेक जण परदेशात रहात असावेत अशी माझी धारणा होती आणि देशांतर्गत सदस्यापैकी पुण्यामुंबईपलीकडे राहणारे कोणी येतील की नाही याबद्दल शंका वाटत होती. त्यामुळे उपस्थितीचा हा आंकडा माझ्या कल्पनेपेक्षा जरासा मोठाच होता.

आलेल्या बारा जणांत मी स्वतः आणि श्री.प्रमोद देव हे दोघे सेवानिवृत्त (किंवा रिकामटेकडे) काका होतो. एकादा अपवाद वगळता बाकीचे सारे जण माहिती तंत्रज्ञानाशी निगडित होते. एका सदस्याचा सिनेक्षेत्रातल्या तांत्रिक बाजू सांभाळण्याचा व्यवसाय होता. माझ्यासकट बहुतेक लोकांनी इतरांचे ब्लॉग फारसे वाचले नसावेत. त्यांवर टीका करण्याची ही वेळ नव्हतीच, पण प्रशंसा करण्याइतपतसुध्दा माहिती कोणाकडे नसावी. त्यामुळे ब्लॉगवरचे लेखन या विषयावर चर्चेची गाडी आली तरी तिथे ती थांबत नव्हती. "ब्लॉग हे एक उद्याचे सशक्त माध्यम आहे. त्याचा चांगला उपयोग करून घेता यायला हवा." वगैरे सूतोवाच करून झाले पण त्यावरून पुढे ती आपल्या देशांतले अज्ञान, गरीबी, महागाई, संपादकांची कात्री, लेखन स्वातंत्र्य, कायद्यातल्या तरतुदी वगैरेकडे भरकटत जात असे. आपल्या स्वांतसुखासाठी मनातल्या विचारांना अभिव्यक्ती देणे यापलीकडचा विचार फारसा कोणी करतांना दिसला नाही.

याला अपवाद होतेच. पुणेकर मंडळींनी पुढाकार घेऊन ब्लॉगलेखकांचे एक संमेलन भरवले होते आणि पुढील वाटचालीसाठी विचारमंथन केले होते असे पुण्याच्या सदस्याने सांगितले. एवढेच नव्हे तर ब्लॉग्जच्या रूपाने साहित्याचे एक दालन उघडले गेले असून मराठी साहित्य संमेलनाने त्याची दखल घ्यावी असा प्रस्ताव त्याच्या अध्यक्षांकडे पाठवला असल्याचेही त्याने सांगितले. आपल्या एका मित्राने आपली ओळख लेखक म्हणून करून दिल्याचा किस्सा एका सदस्याने सांगितला.

अशा गप्पा चाललेल्या असतांनाच प्रसन्न प्रगट झाला आणि शूटिंगची सर्व व्यवस्था झाली असल्याची शुभवार्ता त्याने दिली. त्याबरोबरच आता आधी अल्पोपाहार घेणार की सर्व काम संपल्यावर म्हणजे दोन तासांनंतर तो घ्यायचा अशी विचारणा त्याने केली. तोंपर्यंत दुपारचा दीड वाजून गेला असल्यामुळे माझ्या पोटातल्या ब्रंचचे सुध्दा पचन झाले होते. इतरांचा नाश्तासुध्दा पचलेला असणार. पण भिडेपोटी ते सांगायला कोणी तयार नसावेत किंवा "आधी लगीन शूटिंगचे" असा विचार ते करत असतील. मी मात्र आपल्याला भूक लागली असल्याचे प्रांजलपणे जाहीर करून "आधीच कांही खाद्यंती झाली तर ते बरे होईल" अशी इच्छा व्यक्त केली आणि कोणीही त्याला विरोध दर्शवला नसल्यामुळे ती सूचना एकमताने मान्य झाली. त्याबरोबरच अच्युत गोडबोले यांच्याशी वार्तालापाची दुसरी फेरी सुरू झाली आणि अल्पोपाहार येऊन व तो खाऊन होईपर्यंत ती बराच वेळ चालली. त्यातला एक क्षणसुध्दा कंटाळवाणा गेला नाही.

त्यानंतर आम्ही खाली स्टूडिओच्या बाजूलाच असलेल्या कंट्रोल रूममध्ये गेलो. त्या ठिकाणी असंख्य मॉनिटर ठेवलेले होते आणि त्यावर वेगवेगळ्या कॅमे-यांमधून केले जात असलेले चित्रण आणि संग्रहातून घेतलेली दृष्ये वगैरे दिसत होती. त्यांचे मिश्रण करून प्रक्षेपण करण्यासाठी चित्रफीत करण्याचे काम चालले होते. क्रमाक्रमाने आमच्यातील एकेकाचे शूटिंग व्हायचे होते. त्यापूर्वी आमच्या तोंडाची साग्रसंगीत रंगरंगोटी झाली नाही, तरी पण ब्रशच्या स्पर्शाने थोडीशी साफसफाई झाली. माझा पहिलाच क्रमांक लागल्यामुळे मी सर्वात आधी स्टूडिओत गेलो. यापूर्वी मी दूरदर्शन, ईटीव्ही आणि सहारा या स्टूडिओंमधल्या चित्रणात भाग घेतला असल्यामुळे मला त्या बाबतीत नाविन्य नव्हते. त्या ठिकाणी झगमगणारे आणि उघडझाप करणारे असंख्य रंगीबेरंगी दिवे आणि छताला लटकवलेल्या रुळांवरून उभ्या आडव्या धावणा-या कॅमे-यांच्या ट्रॉल्या पाहून सुरुवातीला चक्रावून गेलो असलो तरी नंतर ते दृष्य ओळखीचे झाले होते. त्यांच्या मानाने पाहता स्टार माझाचा स्टूडिओ पिटुकला दिसला. सी एन एन च्या अॅटलांटा इथल्या केंद्राला भेट देणा-या पर्यटकांना दाखवण्यासाठी एक लहानसा डमी स्टूडिओ ठेवला आहे, तसा हा स्टूडिओ वाटला.

सुरुवातीला मंचावर येऊन निवेदक अश्विन बापट यांनी या कार्यक्रमाची पूर्वपीठिका सांगितली तसेच प्रमुख अतिथींचे स्वागत केले. त्यानंतर अच्युत गोडबोले यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त केले. नंतर आम्हा सर्वांना एकेकाला बोलावून प्रमाणपत्र आणि भेटवस्तू प्रदान करण्यात आली. त्यानिमित्य आम्ही दोन वाक्ये बोलायची की दोन मिनिटे या बाबतीत थोडा घोळ झाल्यामुळे तीन चार वाक्यांत आभार मानले आणि या कार्यक्रमाची सांगता झाली. एक नवा अनुभव आणि कांही नव्या ओळखी यांची प्राप्ती झाली.

Tuesday, January 26, 2010

ब्लॉग माझा स्पर्धा


या ब्लॉगला वाचकांचा चांगला पाठिंबा मिळत गेला आहे याबद्दल मला समाधान आहेच. त्याशिवाय त्याची इतरत्र दखल घेतली गेली तर मग दुधात साखर पडेल असे वाटायचे. गेल्या वर्षी स्टार माझा या वाहिनीने ब्लॉग माझा ही स्पर्धा जाहीर केली आणि या स्पर्धेच्या निमित्याने अशी एक संधी आयती चालून आली. एका सन्माननीय तज्ज्ञ व्यक्तीकडून या ब्लॉगचे मूल्यमापन होऊन याची गणना उल्लेखनीय या सदरात केली गेल्याचे वृत्त मी दिलेच होते. अशा प्रकारची शाबासकीची थाप पाठीवर पडावी हे माझे सुदैवच आहे.

या स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर जवळ जवळ दोन महिने होत आले तरी पुढील हालचाल दिसली नाही. त्यामुळे मनात थोडी शंका उत्पन्न होऊ लागली होती. तेवढ्यात स्टार माझाच्या प्रसन्न जोशींची मेल आली आणि पाठोपाठ फोनही आला. रविवारी २४ तारखेला आमची प्रमाणपत्रे आम्हाला समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची उत्साहवर्धक बातमी त्यांच्याकडून मिळाली. त्या ईमेलमध्ये जो कार्यक्रम दिला होता त्याप्रमाणे दुपारी साडेअकरा ते बारा वाजायच्या दरम्यान स्टूडिओमध्ये पोचायला हवे होते म्हणजे साडेनऊ दहाला घरातून निघायला हवे आणि कार्यक्रम संपल्यानंतर तीन साडेतीन वाजता अल्पोपहार मिळणार होता. दुपारच्या जेवणाचा डबा बरोबर नेला तरी तो खायला संधी मिळेल की नाही याबद्दल शंकाच होती. गोड फळ मिळवण्यासाठी थोडी कळ सोसावी लागते अशी मनाची समजूत घालून त्या कार्यक्रमाला जाण्याच्या तयारीला लागलो. स्टार माझाच्या स्टूडिओचा पत्ता दिलेला होता. गूगलवरून त्या जागेचा नकाशा काढून घेतला. ईमेलमध्ये दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे महालक्ष्मी रेल्वे स्टेशनला जाण्यापेक्षा वरळी नाक्याच्या बाजूने तेथे जाणे अधिक सोयीस्कर वाटल्याने तो मार्ग ठरवला आणि खरोखरच तो सोपा निघाला.

पुढे घडणार असलेल्या उपवासाचा विचार करून घरून निघतांना ब्रेकफास्टच्या ऐवजी ब-यापैकी ब्रंच घेतला. रविवारचा दिवस असल्यामुळे रस्त्यात वाहनांती गर्दी कमी होती. दिलेल्या वेळेच्या अगोदरच जाऊन स्टार टीव्हीच्या ऑफीसापर्यंत जाऊन पोचलो. बाहेरील गेटवरच्या दरवानाला आमच्या आगमनाची वर्दी मिळालेली नसावी. त्याने थोडी विचारपूस केल्यानंतर आंत प्रवेश करायची परवानगी दिली. स्वागतकक्षात नेहमी दिसते तशी स्वागतिका नव्हती, तिथे स्वागतक होता. त्याच्या पोषाखावरून तो सिक्यूरिटी ऑफीसर वाटत होता. त्याला मात्र आमच्या येण्याची कल्पना होती. त्याने समोरच्या कोचावर बसून घ्यायची सूचना केली. त्या कार्यक्रमासाठी येणा-यातला मी पहिलाच असावा अशी माझी कल्पना झाली. कदाचित माझ्याहून आधी आलेल्यांना त्याने आधीच ऑफीसच्या आंत पाठवून दिले असले आणि नंतर येणा-या लोकांना बाहेरच थांबवून ठेवण्याचा आदेश त्याला मिळाला असला तर ते योग्यच होते असे नंतर जाणवले.

माझ्यानंतर कांही मिनिटांनी श्री.प्रमोद देव आले. मनोगतच्या ठाणे कट्ट्यावर त्यांची ओळख झाली होती आणि मिसळपावच्या ई-हॉटेलात अधून मधून भेट होत असे. त्यांच्यासोबत बंगळूरहून आलेले छोटा डॉन आणि ठाण्याचे निखिल देशपांडेही होते. त्यानंतर इतर ब्लॉगकर्ते येत गेले आणि एकमेकांच्या ओळखी करून देत आणि घेत गेले. बाहेरच्या कक्षातल्या बसायच्या जागा भरत आल्यावर आम्हाला आंत पाठवण्यात आले. तिथले दृष्य इतर सर्वसामान्य ऑफीसांपेक्षा थोडे निराळे होते. आजकाल इतर अनेक ठिकाणी दिसते तसेच ते ऑपन ऑफीस असले तरी तिथल्या टेबलखुर्च्या एकाच दिशेने तोंड करून रांगेने मांडल्या नव्हत्या किंवा लहान लहान चौकोनात एकमेकांकडे पाठ करून कोणाला बसवलेले नव्हते. एका मोठ्या हॉलमध्ये पांच सहा जणांचा एक असे अनेक घोळके करून सारे जण बसले होते. अर्थातच प्रत्येकाच्या पुढ्यात एक संगणक होता आणि तो पहाता पहाता एकमेकांशी संवाद साधून एकमेकांच्या सहकार्याने ते सर्वजण काम करत होते. अशा प्रकारच्या व्यवस्थेत अत्यंत कडक शिस्त असायलाच हवी. तशी नसली तर तिचा मासळीबाजार होणे सहज शक्य आहे असा विचार मनात चमकून गेला. त्याच हॉलच्या एका कोप-यात थोड्या खुर्च्या गोळा करून आम्हाला बसवण्यात आले. आधी तर मला थोडे अवघडल्यासारखे वाटले. त्यातून सावरून आमचा मासळीबाजार रंगात येतांना पाहून आमच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली.

ज्या खोलीत आम्हाला पाठवण्यात आले तिचे आकारमान पाहता त्या खोलीचा उपयोग स्टोअररूम किंवा अडगळीची खोली याहून वेगळा होत असेल असे वाटत नव्हते. खोलीत मोकळी हवा येण्यासाठी खोलीत शिरायचा दरवाजा उघडा ठेवून आणि तो बंद होऊ नये म्हणून त्याला एका खुर्चीचा अडसर लावून त्यावर मी विराजमान झालो. सर्वांच्या मनोवृत्ती उल्हसित असल्यामुळे असल्या क्षुल्लक गोष्टींकडे कोणाचे लक्ष जात नव्हते. एकमेकांचे ब्लॉग सोडून इतर अनेक विषयांवर आमच्या मनमोकळ्या गप्पा चालल्या होत्या. आणखी कांही ब्लॉगकर आल्यानंतर त्या खोलीत जास्त खुर्च्या मांडायला जागा उरली नसल्यामुळे कांही लोकांना बाहेर स्वागतकक्षात ठेवलेल्या सोफ्यांवर बसायला सांगण्यात आले. आधी आम्ही सगळेच उठून बाहेर गेलो आणि तिथे सर्वांना पुरेशी जागा नसल्यामुळे अर्धे लोक परत आलो.

फक्त एक अपवाद सोडून इतर सारे पुरस्कार विजेते आले होते आणि त्यातले बहुतेकजण वेळेवर येऊन पोचले होते. थो़ड्या वेळाने प्रमुख पाहुणे येऊन पोचल्याची बातमी आली. उरलेल्या एका स्पर्धिकेची थोडा वेळ वाट पाहून झाल्यानंतर आम्हा सर्वांना त्या इमारतीच्या सातव्या मजल्यावर असलेल्या कँटीनमध्ये नेण्यात आले. त्या प्रशस्त हॉलमध्ये निदान साठसत्तर तरी लोकांनी एका वेळी जेवण घेण्याची सोय दिसत होती, पण जेवण खात असलेला किंवा ते वाढून देत असलेला एकही जण त्या जागी दिसला नाही. अत्यावश्यक कर्मचारी सोडून त्या इमारतीत काम करणा-या इतर सर्वांना बहुधा रविवारची सुटी असल्यामुळे त्या दिवशी कँटीन बंद असावे.

प्रमुख पाहुणे श्री. अच्युत गोडबोले आल्यावर आम्ही सारेजण आपापल्या खुर्च्या सरकवून त्यांच्या भोंवताली गोळा झालो. प्रसन्न जोशीने त्यांची औपचारिक ओळख करून दिली आणि तो पुढच्या कार्यक्रमाचे संयोजन करण्यासाठी चालला गेला. अच्युतरावांना सर्वजण ओळखत होतेच. फक्त त्यांचे नांव सांगणे पुरेसे होते. खरे तर त्यांचा फोटोसुध्दा अनेक वेळा वर्तमानपत्रात पाहिला असल्यामुळे चेहरासुध्दा ओळखीचा होताच. त्यांनी लिहिलेली पुस्तके कांही लोकांनी वाचली होती. एकाने तर त्या पुस्तकांची पारायणे केली असल्याचे सांगितले. यापूर्वी एका कार्यक्रमात मी त्यांना प्रत्यक्ष जवळून पाहिलेले होते. समोरासमोर बसून वार्तालाप करण्याची मात्र ही पहिलीच वेळ होती.

त्यांनी या ब्लॉगस्पर्धेत परीक्षण केले होते. हे परीक्षण कोणत्या निकषांवर केले गेले हे त्यांनी आधी थोडक्यात सांगितले. पिंडे पिंडे रुचिर्भिन्ना या संस्कृत सुभाषितानुसार प्रत्येक माणसाच्या आवडीनिवडी आणि त्याची मते भिन्न असणारच. परीक्षकाच्या वैयक्तिक आवडी किंवा मते यांच्याशी त्या गोष्टी जुळतील अशी अपेक्षाच नव्हती. त्या कशा प्रकारच्या आहेत यावर भर न देता प्रत्येकाच्या ब्लॉगवर त्या कशा प्रकारे मांडल्या गेल्या आहेत हे पाहिले गेले. ब्लॉगचा विषय, आशय, मांडणी, सजावट, त्याला आलेले प्रतिसाद वगैरे पाहून त्याला कांही गुण दिले गेले आणि त्यांची बेरीज करून सर्वांगसुंदर अशा ब्लॉग्जची निवड करण्यात आली असे त्यांनी सांगितले.

. . . . . . . . . .. (उत्तरार्ध पुढील भागात)