Thursday, July 09, 2009

जन्मतारीख - भाग १


लहानपणचा वाढदिवस
आजकालची लहान मुले आपले नांव सांगायला लागतात त्याच्यापाठोपाठच आपली जन्मतारीखसुद्धा सांगायला शिकतात असे दिसते. आमच्या ईशा आणि इरा यांना आपापल्या नांवांमधल्या श आणि र चा उच्चारसुद्धा नीट जमत नव्हता तेंव्हापासून त्या "सोळा जूनला माझा बड्डे आहे." असे सांगायच्या. 'सोळा' ही एक 'संख्या' आहे आणि 'जून' हे एका 'महिन्या'चे नांव आहे एवढेसुध्दा कळण्याइतकी समज त्यांना तेंव्हा आलेली नव्हती, कारण संख्या किंवा महिना या संकल्पनाच त्यांना कळलेल्या नसाव्यात, पण 'बड्डे' म्हणजे 'धमाल' एवढे त्यांना पक्के समजलेले होते. त्यामुळे ते नेहमी नेहमी येत रहावेत असे त्यांना वाटत असे. अधून मधून त्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या बर्थडे पार्ट्यांना जाऊन तिथे धमाल तर करायच्याच, इतर दिवशी आपल्या भातुकलीच्या खेळात मिकी उंदीरमामा, टेडी अस्वल किंवा बार्बी भावली यांचे वाढदिवस 'मनवत' असत.

मला मात्र शाळेतून बाहेर पडेपर्यंत माझी जन्मतारीख माहीत सुध्दा नव्हती. सर्व प्रसिध्द लोकांना असते तशी मलासुद्धा एक जन्मतारीख असायला हवी अशी अनामिक जाणीव मला दहा बारा वर्षाचा झाल्यानंतर झाली होती, पण ती तारीख नेमकी कोणती आहे हे मात्र कळले नव्हते. माझ्याच जन्मतारखेचे कांही गूढ होते अशातला भाग नाही, कारण त्या काळात घरातल्या कुणालाच कुणाचीच जन्मतारीख माहीत नव्हती. किंबहुना त्या काळात जन्मतारीख या विषयाचा बोलण्यात कधी उल्लेखच होत नसे. मोठ्या माणसांची वाढ होणेच थांबलेले असेल तर त्यांचा वाढदिवस कसला करायचा? लहान मुलांचे वाढदिवस तिथीनुसार येत. पण ते 'साजरे' केले जात असे म्हणणे आजच्या काळात धार्ष्ट्याचे होईल कारण त्या दिवशी घरात कसलाही समारंभ, गडबड, गोंधळ वा गोंगाट होत नसे.

तरीसुद्धा मला माझा वाढदिवस येण्याची खूप आतुरता वाटत असे. गणपतीचा उत्सव झाला की मला पक्षपंधरवड्याचे वेध लागत असत. हे दिवस मला कधीच 'अशुभ' वाटले नाहीत. मोठा झाल्यानंतरसुध्दा घरातल्या कित्येक वस्तू मी याच काळात विकत आणल्या आणि माझ्यासारख्याच त्यासुद्धा ब-यापैकी चालल्या ! जन्मतिथीच्या एक दोन दिवस आधी ट्रंकेतले नवे कोरे कपडे काढून त्यातले कोणते कपडे त्या दिवशी घालायचे ते ठरवायचे. एकत्र कुटुंबांमधील घरातल्या सगळ्या मुलांसाठी ऊठसूट नवे कपडे त्या काळात शिवले जात नव्हते. पुण्यामुंबईकडे रेडीमेड कपडे विकत मिळतात असे नुसते ऐकले होते. आमच्या गांवात ड्रेसेसचे दुकान अजून उघडले गेले नव्हते. एकेका मुलासाठी वेगळ्याने त-हेत-हेचे कपडे शिवणे कल्पनेच्या पलीकडे होते. घरातल्या सरसकट सगळ्यांसाठी नवे कपडे शिवून आणल्यावर ते ट्रंकेत भरून ठेवले जात. सणवार, लग्नकार्य अशा प्रसंगी कांही वेळा घालून झाल्यानंतर यथावकाश गरजेनुसार ते रोजच्या वापरात येत असत. वाढदिवस हा खास माझा असल्यामुळे त्यासाठी फक्त माझे नवे कपडे ट्रंकेतून बाहेर निघत, याचे अप्रूप वाटायचे.

वाढदिवसाच्या दिवशी सकाळी दिवाळीप्रमाणे अंगाला सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करायचे, कोरे कपडे अंगावर चढवायचे, कोणाच्या तरी मुंजीत घरी आलेली एकादी जरीची टोपी डोक्यावर ठेवायची आणि देवाला नमस्कार करून पाटावर बसायचे. प्रौक्षण वगैरे करून झाल्यावर घरातल्या सगळ्या मोठ्यांच्या पाया पडायचे. मोठी माणसे "मोठा हो, शहाणा हो, उदंड आयुष्यवंता हो." असे तोंडभर आशीर्वाद देत आणि मोठी भावंडे या निमित्याने पाठीत धपाटा घालून घेत. पण या दिवशी त्यावरून मारामारी करायची नाही, चिडायचे नाही, रडायचे नाही, हट्ट किंवा आक्रस्ताळेपणा करायचा नाही, शहाण्यासारखे चांगले वागायचे वगैरे ठरलेले असे.

सुसंस्कृत लोकांना बायकांमुलांसह एकत्र बसून जिथे खातापिता येईल अशा प्रकारचे हॉटेल आमच्या लहान गांवात अजून उघडलेले नव्हते. गरजू व शौकीन लोकांना चहा, चिवडा, भजी वा मिसळ वगैरे पुरवणा-या ज्या जागा होत्या तिथे फक्त उडाणटप्पू लोक वात्रटपणा करण्यासाठी जातात अशी आमची पक्की समजूत करून दिलेली असल्यामुळे लहानपणी कधीही तिथे पाऊलदेखील टाकले नव्हते. त्यामुळे आमचे खाद्यजीवन घरी तयार होत असलेल्या खाद्यपदार्थांपर्यंतच मर्यादित होते. कांही विशिष्ट बाबतीत ते आजच्यापेक्षा अधिक समृद्ध असले तरी त्याचा एकंदरीत आवाका लहान वयाला साजेसाच असायचा. त्या काळात ज्या मुलाचा वाढदिवस असे त्याच्या आवडीचे शक्य तितके पदार्थ जेवणात असत. जेवणात पंक्तीप्रपंच आणि मर्यादा नसल्याने ते सर्वांसाठी पोटभरच असत. वाढदिवस ज्याचा असेल त्याला अधिक आग्रहाने खाऊ घातले जाई एवढेच.पण हे सगळे घरातल्या घरातच होत असे. त्या दिवशी बाहेरच्या इतर कुणाला आमंत्रण वगैरे दिले जात नसे. त्यामुळे भेटवस्तू देणे घेणे वगैरे प्रकार नव्हतेच. दिवसभर घराचे दरवाजे उघडेच असल्याने या ना त्या निमित्याने कोणी ना कोणी येत असे. त्यांना त्या दिवशी बनवलेल्या खास पदार्थाचा वाटा अनायास मिळून जात असे. इतर लोकांना या वाढदिवसाची खबरबात समजणे जवळजवळ अशक्य होते. तरीसुद्धा आपला वाढदिवस हा 'खास आपला' असा इतर दिवसांपेक्षा वेगळा दिवस आहे या विचाराने तो हवाहवासा वाटेच!

. . . . . . . . . . . . . . . .(क्रमशः)

Tuesday, July 07, 2009

पडू आजारी - एक स्वानुभव


या घटनांना आता तीन वर्षे होत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे थोडे तटस्थ नजरेने पहाणे शक्य आहे.


शिकलो काव्य "पडू आजारी, मौज हीच वाटे भारी"।
बालपणीच्या पुस्तकांतली गंमत खाशी ती न्यारी।।


दहा जणांचे कुटुंब होते नंदनवन पृथ्वीवरचे।
गोजिरवाणे बालक तेथे कौतुक सर्वांना त्याचे।।
झाली सर्दी तया खोकला तापहि आला बारीकसा।
आजारी वदती ते त्याला सारे देती भरंवसा।।
मऊ भात वर तूप मेतकुट ऊन ऊन देती सांजा।
विश्रांती घेरे बाळा तू आता शाळेला ना जा।।
पाठीवर मायेने फिरती थरथरते हात वडिलधारी।
तयास वाटे पडू आजारी गंमत ही वाटे भारी।।१।।

काळही सरला त्याने नेले ओढुनिया प्रेमळ हांत।
पोटासाठी भटकत फिरते नवी पिढी परदेशांत।।
विस्कटली ती कुटुंबसंस्था विखरुनि गेली सारीजणे।
आपआपुल्या घरट्यामध्ये राहतात चिमणाचिमणे।।
सर्व आधुनिक उपकरणांने नित्य घडे त्यांची सेवा।
संसाराचा सुखी दिखावा इतरांना वाटे हेवा।।
रक्तचाप मधुमेह वगैरे पण व्याधी जडल्या शरीरी।
पडावयाचे नच आजारी उगा व्हायचे कांहीतरी।।२।।


प्रभात ओली चिंब प्रगटली रिमझिम पाऊस लेवूनी।
विचार करतो भ्रमण करावे हातांत छत्री घेऊनी।।
आणि अचानक काय जाहले तया न येई उमजूनी।
डळमळले भूमंडळ सारे सिंधूजळ भासे गगनी।।
गरगर सारे फिरू लागले घरही तयाच्या सभोवरी।
उलट्या होती एकसारख्या अंगी ये ग्लानी भारी।।
दीन अवस्था पाहताक्षणी पत्नी त्याची त्वरा करी।
"अहो किती पडलात आजारी, चला झणी डिस्पेन्सरी"।।३।।


कसेबसे त्याला गाडीने चिकित्सालयाप्रति नेले।

नाडीचे ठोके मोजियले रक्तदाबही तपासले।।

झाले होते स्वैरभैर ते क्षणी घटे तर क्षणि वाढे।

दिधले डाक्टरने इंजेक्शन त्वरित तयाच्या शिरेमध्ये।।

आली निद्रा गाढ म्हणावी कां ग्लानी तेही न कळे।

रक्तचाप नाडी यांचे पण हळूहळू सांधे जुळले।।

होईल सारे सुरळित सांगुन दिले धाडुनी माघारी।

विसंबुनी त्यावर आजारी परतोनी आला स्वघरी।।४।।

सततचि होता वांत्या त्याच्या शरीरातले द्रव घटले।
पुनर्द्रवीकरणाचे चूर्ण सिस्टरने होते दिधले।।
द्रावण करुनी त्याचे त्याने घोटघोट प्राशन केले।
वमनक्रिया अनिवार परंतु सारे उलटे परतवले।।
इस्पितळामध्ये नेऊनी तयास मग एडमिट केले।
सलाईन इंजेक्शनद्वारे औषधोपचार चालविले।।
रात्रभरीच्या त्रासानंतर प्रातःकाली स्थिती बरी।
कशामुळे पडलो आजारी याचा सतत विचार करी।।५।।

वांत्या त्याच्या पु-या थांबता शीशभ्रमण कमी झाले।
नवी समस्या नवेचि प्रकरण त्यात अचानक उद्भवले।।
अठरा तास उलटुनी गेले उत्सर्जन नाही घडले।
घट्ट किवाडे बंद तयांची शरीर व्याकुळ तळमळले।।
नळ्या खुपसुनी करता निचरा पुढला मार्ग सुरू झाला।
दुस-या द्वारी जुनाट शत्रू उग्र रूप धारुन आला।।
मूलाधारसमस्या जागृत झाली जोमाने द्वारी।
असह्य त्याच्या कळा आजारी सहन कशा करणार तरी।।६।।

शल्यविभागामध्ये नेले उपाय सांगितला त्यानी।
रक्तदाब मधुमेह यावरी पूर्ण नियंत्रण घालोनी।।
खात्री पटल्यावर करायचे छोटेसे आपरेशन।
त्या दृष्टीने सुरू जाहले इन्शुलिन इंजेक्शन।।
दोन दिवस झाल्यावर त्यांचे झाले पूर्ण समाधान।
तपासण्यांचे रिपोर्ट आले ते प्रयोगशाळेतून।।
दुस-या कक्षामध्ये निजवले पूर्ण करायासी तयारी।
घटनाचक्राने आजारी गोंधळला पुरता भारी।।७।।

शल्यक्रियेच्या रुग्णांमध्ये त्याची व्याधी अतिक्षुद्र।
आडजागी निजवले तयाला कुणा न चिंता ना कदर।।
आणि अचानक उठला रात्री शिरामध्ये तीव्र शूळ।
चैन उडाली वांत्या झाल्या डळमळले भूमंडळ।।
खूप विव्हळल्यावरती दिधले सलाईन इंजेक्शन।
पूर्वतयारी तरीही करती करावया आपरेशन।।
तळमळला धांवाही करतो कुणी वांचवा धांव हरी।
नच पाडू ऐसा आजारी यातना जया जिव्हारी।।८।।

दुसरे दिवशी येता भार्या तिज सांगितली कर्मकथा।
शल्यक्रिया तहकूब करोनी पुन्हा पाहिली मुख्य व्यथा।।
विचारविनिमय करुन धाडले मज्जातज्ञाचियाकडे।
तपासुनी निष्कर्श काढला हे तर मेंदूचे कोडे।।
एम.आर.आय. चित्रात पाहिले छोट्या मेंदूचे कष्ट।
रक्तवाहिन्यांच्या एम.आर.ए. ने केले चित्र स्पष्ट।।
निदान निश्चित झाले आणिक सुरू औषधे मग दुसरी।
आशेवर राही आजारी मनोमनी पण अधांतरी।।९।।
.
.
.
.
.
.

सरले दुखणे, हळूहळू मग, गाडी आली रुळावरी ।
पडलो होतो आजारी पण , मौज वाटली नच भारी ।।

Friday, July 03, 2009

अवघे गरजे पंढरपूर


आषाढी वारीसाठी गांवोगांवातून निघालेल्या दिंड्या, पालक्या यांच्या मार्गक्रमणाविषयीचे वृत्तांत आणि त्यांची क्षणचित्रे गेले कांही दिवस वर्तमानपत्रात व दूरचित्रवाणीच्या सर्व मराठी वाहिन्यांमधून रोज पहायला मिळत होते. या सोहळ्याचा सर्वोच्च बिंदू आज देवशयनी एकादशीला गांठला गेला. हे सारे वारकरी तर पंढरपूरला पोचलेच, त्याखेरीज रेल्वेगाड्या, बसगाड्या, खाजगी वाहने भरभरून भाविकांनी पंढरपूर गांठले. यासाठी खास गाड्या तर सोटलेल्या होत्याच, पण जेवढी गर्दी डब्यांच्या आंत असेल तेवढीच गाड्यांच्या टपावरदेखील दिसत होती. सुमारे दहा लाखांवर भाविक या यात्रेला आले असावेत असा अंदाज वर्तवला जात आहे.

या सगळ्या लोकांनी काय केले असेल? चंद्रभागेला भरपूर पाणी आलेले आहेच, त्यात डुंबून घेतल्यानंतर जेवढ्या लोकांना जमले असेल तेवढे लोक दर्शनासाठी रांगेत उभे राहिले असतील. बाकीच्या लोकांनी विठ्ठलाच्या नामाचा गजर करून भीमातीर दुमदुमून टाकले असणार. कवी अशोकजी परांजपे यांनी याचे असे सुंदर वर्णन केले आहे.
अवघे गरजे पंढरपूर । चालला नामाचा गजर ।।
टाळघोष कानी येती । ध्यानी विठ्ठलाची मूर्ती ।
पांडुरंगी नाहले हो । चंद्रभागातीर ।।१।।
इडापिडा टळुनी जाती । देहाला वा लाभे मुक्ती।
नामरंगी रंगले हो । संतांचे माहेर ।।२।।
देव दिसे ठाई ठाई । भक्त लीन भक्तापायी ।
सुखालागी आला या हो । आनंदाचा पूर ।।३।।

पंढरीला होणारी ही यात्रा गेली सात आठ शतके इतका काळ दरवर्षी भरत आली आहे. संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या काळातील वारीचे वर्णन करतांना असे म्हंटले आहे.
कुंचे पताका झळकती । टाळ मृदूंग वाजती ।
आनंदे प्रेमे गर्जती । भद्रजाती विठ्ठलाचे ।।
आले हरीचे विनट । वीर वि़ठ्ठलाचे सुभट ।
भेणे झाले दिप्पट । पळती थाट दोषांचे ।।

त्यांचे समकालीन संत नामदेवांनीसुद्धा विठ्ठलाच्या वाऱीकरांचे सविस्तर वर्णन केले आहे. त्यांचे एकमेकांबरोबर वर्तन कशा प्रकारचे असायचे हे संत नामदेवांनी किती छान शब्दांत दाखवले आहे?
एकमेका पुढे लवविती माथे ।
म्हणती आम्हाते लागो ऱज ।।
भक्ति प्रेमभाव भरले ज्यांच्या अंगी ।
नाचति हरिरंगी नेणती लाजु ।।
हर्षे निर्भर चित्तीं आनंदे डोलती ।
हृदयी कृष्णमूर्ती भेटो आली ।।

हे सगळे महात्म्य पंढरीलाच कां आहे याबद्दल नामदेव महाराज सांगतात.
आधी रचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी।।
जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर।।
संत तुकारामांनी म्हंटले आहे.
उदंड पाहिले उदंड ऐकिले। उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे ।
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर। ऐसै विटेवर देव कोठे ।।
ऐसे संतजन ऐसे हरिदास । ऐसा नामघोष सांगा कोठे ।
तुका म्हणे आम्हा अनाथाकारणे । पंढरी निर्माण केली देवे ।।

अशा या अद्वितीय नगरीला जाऊन विठ्ठलाचे भक्त किती आनंदित होतात आणि काय धमाल करतात याबद्दल तुकोबाराय सांगतात.
खेळ मांडियेला वाळवंटी ठाई। नाचती वैष्णव भाई रे।
क्रोध अभिमान केला पावटणी। एक एका लागती पायीं रे।। १।।
नाचती आनंद कल्लोळीं। पवित्र गाणे नामावळी रे।
कळिकाळावरी घातली कास। एक एकाहुनी बळी रे।। २।।
गोपीचंदन तुळशीच्या माळा । हार मिरविती गळा रे ।।
टाळमृदुंगघाई पुष्पवर्षाव । अनुपम सुखसोहळा रे ।।३।।
लुब्धली नादी लागली समाधी। मूढजन नारी लोका रे ।
पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिद्धसाधका रे ।।४।।
वर्ण अभिनाम विसरली जाती । एकएका लोटांगणी जाती रे ।।
निर्मळ चित्ते झाली नवनीते । पाषाणा पाझर सुटती रे ।।५।।
होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे ।।
तुका म्हणे सोपी केली पायवाट । उतरावया भवसागर रे ।।६।।

अशा सोप्या केलेल्या पायवाटेवरून जावे असे वाटून लक्षावधी लोकांनी त्यावरून जाऊन तिचा हमरस्ता केला आणि नामस्मरणाच्या घोषाने पंढरपूरचे वातावरण दुमदुमून गेले.

Tuesday, June 30, 2009

सांचीचे स्तूप - भाग ४


सांची येथील स्तूपांची प्रवेशद्वारे किंवा तोरणे हा सांचीदर्शनाचा सर्वात जास्त आकर्षक, सुंदर आणि महत्वपूर्ण भाग आहे. कल्पकता, कलादृष्टी, हस्तकौशल्य आणि चिकाटी या सर्व गुणांचा परमोच्च असा संगम या शिल्पकृतींमध्ये झालेला दिसतो. सांची येथील मुख्या स्तूपाच्या चार दिशांना चार भव्य अशी तोरणे आहेत, तर इतर स्तूपांसमोर एक किंवा दोन आहेत. मूळ स्तूपांचे बांधकाम होऊन गेल्यानंतर शेदोनशे वर्षांनंतर ही तोरणे बांधली गेली असे पुरातत्ववेत्ते सांगतात. तशी ती मुख्य स्तूपांपासून वेगळीच आहेत.

प्रत्येक तोरणासाठी जमीनीवर दोन उंच असे स्तंभ उभे केले आहेत. प्रामुख्याने हे चौकोनी आकाराचे आहेत, पण कांही ठिकाणी त्याच्या कडा घासून तिथे नक्षीकाम केले आहे तर कांही जागी त्यात सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. चार हत्ती, चार सिंह किंवा चार बटू वगैरे आकृती अशा खुबीने कोरल्या आहेत की वरील तोरणाचा भार ते उचलून धरत आहेत असेच वाटते. या दोन खांबाच्या माथ्यावर विशिष्ट अशा वक्र आकाराच्या तीन आडव्या शिळा ठेवल्या आहेत. त्यातील दर दोन शिळांमध्ये एक पोकळी ठेऊन त्या पोकळ्यांमध्ये तसेच सर्वात वरील शिळेच्या माथ्यावर सुंदर मूर्ती ठेवल्या आहेत. हे सारे शिल्प एकाच अखंड प्रस्तरातून कोरले आहे असे वाटत नाही, पण त्यामधले सांधे बेमालूम पध्दतीने जोडले आहेत, त्यामुळे ते सहजपणे दिसून येत नाहीत.

या कमानींचे उभे खांब व आडव्या पट्ट्या यांवर अगणित सुरेख शिल्पे कोरलेली आहेत. ती सारी पॅनेल्सच्या स्वरूपात आहेत. द्विमिती चित्रांनाच थोडा उठाव देऊन त्यातून त्रिमितीचा भास निर्माण केला आहे. अनेक प्रकारच्या आकृती या चित्रांमध्ये एकमेकीमध्ये गुंतवल्या असल्यामुळे सत्य आणि कल्पित यांचे अगम्य असे मिश्रण या कलाकृतींमध्ये दिसते. यातील चित्रांचे मुख्य विषय आहेत :

१. जातक कथांमधील दृष्ये
२. गौतम बुध्दाच्या आयुष्यातील प्रसंग
३. बौध्द धर्माशी निगडित बुध्दानंतरच्या काळातील प्रसंग
४. मानुषी बुध्दांशी निगडित दृष्ये
५. विविध प्राणिमात्र व वनराई वगैरेंची चित्रे आणि कलाकुसर

जातक कथांमध्ये गौतमबुध्दाच्या पूर्वायुष्याच्या गोष्टी आहेत. ती बौध्दधर्मीयांची पुराणे आहेत असे म्हणता येईल. या पूर्वजन्मांमध्ये गौतमाने मनुष्य रूपात तसेच विविध प्राणी व पक्षी यांच्या रूपात जन्म घेतले होते. त्यात छद्दंत नांवाचा सहा दांत असलेला गजराज, महाकपी नांवाचा वानर, एक शिंग असलेले हरिण वगैरेंच्या उद्बोधक कथा आहेत. समा नांवाच्या मातृपितृभक्त मुलाची गोष्ट श्रावणबाळाच्या गोष्टी सारखी आहे. या कथांमधील प्रसंग चित्रमय पध्दतीने दाखवले आहेत. प्रत्येक चित्रामधील अनेक पात्रांच्या मुद्रा व त्यांचे हांवभाव पाहण्यासारखे आहेत.

गौतमबुध्दाच्या जीवनातले प्रसंग त्याच्या जन्माच्या आधीपासून सुरू होतात. त्याची आई मायादेवी हिला एक दृष्टांत होऊन एक महात्मा तिच्या उदरी जन्माला येणार असल्याचे समजते. सिध्दार्थाच्या जन्मामुळे राजधानीत सर्वांना आनंदीआनंद होतो, त्यानंतर कुमार सिध्दार्थाचे बालपण, यशोधरेबरोबर विवाह, त्याने रथात बसून राज्याचे निरीक्षण करायला बाहेर पडणे, घरदार सोडून रानात जाणे, बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती होणे वगैरे सारा कथाभाग कांही प्रत्यक्ष रूपाने तर कांही अप्रत्यक्ष रूपाने दाखवला आहे.

एक सजवलेला घोडा त्यावर आरूढ झालेल्या राजकुमाराला घेऊन रानाच्या दिशेने जातो आणि उलट दिशेने एक रिकामा घोडा खाली मान घालून परत येतांना दिसतो एवढ्या दोन चित्रांतून गौतमाचे तपश्चर्या करण्यासाठी रानात जाणे सूचित केले आहे. त्याचप्रमाणे बोधीवृक्षाखाली गौतमाची आकृती न दाखवताच त्याचे तिथे असणे सूचित केले आहे.

बौध्द धर्माच्या प्रसारार्थ गौतमबुध्दाने तसेच त्याच्या प्रमुख अनुयायांनी मोठमोठे दौरे काढून जागोजागी प्रवचने दिली, संघ स्थापन केले, त्यांना अनेकविध माणसे भेटली. त्यात कांही राजे होते तर कांही दीनवाणे पीडित लोक होते, कांही पंडित होते तशाच गणिकासुध्दा होत्या. या सर्वांचा कसा उध्दार झाला हे वेगवेगळ्या कथांमध्ये सांगितले आहे. महावीर हा अखेरचा तीर्थंकर होता तसेच गौतम हा शेवटचा बुध्द होता, त्याच्या आधीसुध्दा कांही बुध्द होऊन गेले अशी बौध्दधर्मीयांची मान्यता आहे. त्या सर्वांच्या जीवनाशी निगडित कथा आहेत. या सर्वच गोष्टी चमत्कारांनी भरल्या आहेत. त्यातल्या त्यात ज्या शक्यतेच्या कोटीतल्या वाटतात त्यांचा समावेश इतिहासात केला गेला असावा. सांची येथील तोरणांवरील चित्रांत शक्य व अशक्य या दोन्ही प्रकारच्या गोष्टी दाखवल्या असल्यामुळे त्या एकमेकीत मिसळून गेल्या आहेत. लक्षपूर्वक पाहून त्या चित्रांचा अर्थ लावावा लागतो.

याशिवाय अनेक प्रकारचे जलचर व थलचर पशु, पक्षी तसेच झाडे, पाने, फुले वगैरेंनी ही चित्रे सुशोभित केलेली आहेत. त्यातले अनेक पाकळ्यांचे कमळ, धम्मचक्र, स्तूपाचा बाह्य आकार, बोधीवृक्ष, त्याखाली जिच्यावर बसून गौतमबुध्दाने तप केले ती शिला, सम्राट अशोकाचे चार सिंह वगैरे कांही प्रतीके अनेक जागी कोरलेली दिसतात. हे चार सिंह आणि चक्र यांना भारताच्या नाण्यांवर व नोटांवर स्थान मिळाले आहे.

तोरणाचे स्तंभ आणि आडव्या शिला यांच्या माथ्यावरील मोकळ्या जागांवर पूर्णपणे त्रिमित अशा आकृती आहेत. यांत घोड्यावर किंवा हत्तींवर बसलेले स्वार, नृत्य करणा-या नर्तकी वगैरे आहेत. कांही मनुष्याकृतींना तर आतल्या बाजूला पहाणारे एक आणि बाहेरच्या बाजूने पहाणारे दुसरे अशी दोन दोन तोंडे आहेत. माणसाने बाह्य सृष्टीकडे लक्ष द्यावे तसेच अंतर्मुखसुध्दा व्हावे असे यातून सुचवले आहे.

अशा प्रकारच्या खूप मजा इथे आहेत. ही चित्रे पाहण्यासारखी आहेतच, पण त्याबरोबर विचार करायला लावणारी आहेत. मात्र त्यासाठी बौध्द धर्म, त्याचे तत्वज्ञान, त्यांच्या समजुती वगैरेंची माहिती असायला हवी.
. . . . . . . . . . (समाप्त)

Monday, June 29, 2009

सांचीचे स्तूप - भाग ३

अठराव्या शतकाच्या अखेरीस इंग्रजांनी भारतात चांगलेच हातपाय पसरवले होते. मोगलाई आणि मराठेशाही लयाला चालली होती. त्यांच्या प्रमुख सरदारांना राजेपद आणि नबाबी देऊन इंग्रजांनी आपले मांडलिक बनवले होते. त्या राजांना संरक्षण, मदत, सल्ला वगैरे देण्याचे निमित्य करून जागोजागी इंग्रज अंमलदार पेरून ठेवले होते आणि त्यांच्या दिमतीला कवायती फौजा दिल्या होत्या. जे याला तयार झाले नाहीत त्यांची राज्ये खालसा करून इंग्रजांच्या अधिपत्याखाली आणण्याचा सपाटा चालवला होता. सन १८१८ मध्ये त्यांनी पुण्यातली पेशवाई कायमची बुडवली त्याच वर्षी भोपाळच्या नवाबाच्या पदरी असलेल्या जनरल टेलरला सांचीचा स्तूप अचानक सापडला. टेहेळणी करण्याकरता तो तिथल्या टेकडीवर चढून गेला असतांना झाडाझुडुपांच्या आत लपलेल्या स्तूपाचा भाग त्याला दिसला. झाडेझुडुपे तोडून आणि दगडमातीचा ढिगारा बाजूला केल्यावर त्याला स्तूपाचा आकार दिसला आणि त्याने त्या गोष्टीची नोंद केली.

त्या पुरातन वास्तूच्या आत एकादा खजिना गाडून ठेवला असल्याची भूमका उठली आणि त्याच्याबरोबरच त्या द्रव्याचे रक्षण करणारी एकादी दैवी किंवा पैशाचिक शक्ती त्या जागी वास करत असल्याच्या वावड्याही उठल्या. त्यांना न जुमानता कांही धीट भामट्यांनी स्तूपाच्या आतमध्ये आणि आजूबाजूला बरेच खोदून पाहिले आणि खजिन्यांऐवजी अस्थी किंवा राखेने भरलेले कलश मिळाल्यावर कपाळाला हात लावला आणि हाताला लागेल ते उचलून नेले. या सगळ्या गोंधळात येथील प्राचीन ठेव्याचा बराच विध्वंस झाला. अशोकाने स्तूप बांधतांना त्याच्या समोर दगडाचा एक सुरेख स्तंभ उभा केला होता. त्याचे तुकडे नंतर शेजारच्या गावातल्या जमीनदाराकडे मिळाले. तेलबियांमधून तेल गाळण्यासाठी किंवा उसाचा रस काढण्यासाठी त्यांचा उपयोग केला जात होता म्हणे.

इंग्रजी राज्य स्थिरस्थावर झाल्यानंतर ब्रिटीशांच्या केंद्रीय सरकारमध्ये पुरातत्वशाखेची स्थापना करण्यात आली आणि त्या खात्यातर्फे या जागी योजनाबध्द रीतीने उत्खनन आणि साफसफाई करून जमीनीखाली दडलेली देवळे, स्तूप, कमानी, निवासस्थाने वगैरे काळजीपूर्वक रीतीने शोधून काढण्यात आली. पडझड जालेल्या सर्व स्तूपांची डागडुजी आणि आवश्यक तेवढी पुनर्बांधणी करून त्यांना पूर्वीची रूपे देण्यात आले. या कामाचे सर्वाधिक श्रेय सर जॉन मार्शल यांनी सन १९१२ ते १९१९ या काळात केलेल्या अभूतपूर्व अशा कामगिरीला जाते. त्यांनी पाया घालून दिल्यानंतर पुढे आलेल्या संशोधकांनी हे काम चालू ठेवलेच आणि आजही ते चाललेले आहे. जागतिक कीर्तीच्या पुराणकालीन अवशेषांमध्ये म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये सांचीचा समावेश होतो आमि जगभरातले अभ्यासू या जागंला भेट देण्यासाठी इथे येतात.

इतस्ततः सापडलेले कमानींचे तुकडे गोळा करून आणि जोडून त्या उभ्या करण्यात आल्या. अशोकस्तंभ मात्र पुन्हा एकसंध करता येण्यासारखा नसल्यामुळे खंडितच राहिला. त्याचा जमीनीलगतचा खालचा भाग स्तूपाच्या जवळच जमीनीत गाडलेल्या स्थितीत आहे. मधला मोठा तुकडा आडवा करून एका शेडमध्ये ठेवला आहे आणि चार दिशांना चार सिंहाची तोंडे असलेला शीर्षभाग म्यूजियममध्ये ठेवला आहे. आतून भरीव असलेले स्तूपसुध्दा कालौघात अभंग राहिलेले नव्हते त्या ठिकाणी बांधकाम करून उभारलेली देवळे टिकणे शक्यच नव्हते. त्यामुळे ती सगळी भग्नावस्थेत सापडली आणि त्याच अवस्थेत राखून ठेवली आहेत. उभे असलेले सुंदर खांब, कांही तुळया, चौकटी, कोनाडे, शिखरांचे भाग वगैरेवरून तत्कालिन वास्तुशिल्पकलेचा पुरेसा अंदाज येतो. त्यातली कोणतीच वास्तु आकाराने भव्य नाही, पण ज्या आकाराच्या दगडांचा वापर त्यात केलेला दिसतो ते पाहता कोणत्याही यांत्रिक सहाय्याशिवाय या शिला खडकातून खोदून कशा काढल्या असतील, कशा तिथवर आणल्या असतील आणि कशा रीतीने खांबांवर चढवल्या असतील याचे कौतुक वाटते. एका जागी रांगेत ओळीने उभ्या असलेल्या सात आठ उंच खांबांवर सरळ रेषेत मोठमोठ्या फरशांच्या तुळया मांडून ठेवल्या आहेत. त्यांना पाहून अशा प्रकारच्या ग्रीक व रोमन अवशेषांची आठवण येते.

पूर्वीच्या काळातल्या मठांच्या अस्तित्वाच्या खुणा अनेक ठिकाणी दिसतात. त्यातील एका मुख्य जागी एक संपूर्ण मठच उत्खननातून बाहेर निघाला आहे. या आयताकृती जागेत सरळ रेषेत अत्यंत प्रमाणबध्द अशा अनेक लहान लहान चौकोनी खोल्या दगडांच्या भिंतीतून बांधल्या होत्या. देशविदेशातून आलेले बौध्द धर्माचे विद्वान, प्रसारक आणि विद्यार्थी तिथे राहून अध्ययन, अध्यापन, ध्यानधारणा वगैरे गोष्टी करत असतील. मठाच्या या इमारतींना लागूनच एक अवाढव्य आकाराचा दगडी कटोरा ठेवला आहे. सर्व भिख्खूंना मिळालेले अन्न त्यांनी त्यात टाकायचे आणि सर्वांनी मिळून ते भक्षण करायचे असा रिवाज त्या काळी असावा.

या जागी केलेल्या उत्खननात अगणित नाणी, मातीच्या भांड्यांचे तुकडे वगैरे मिळाले आहेत. अनेक लहान मोठ्या आकाराच्या दगडी प्रतिमा आहेत. त्यातील कांही बहुतांश शाबूत आहेत, कांहींचे थोडे तुकडे निघाले आहेत, तर कांही छिन्नविछ्छिन्न अवस्थेत आहेत. अनेक शिलालेख आहेतच, शिवाय खांब, तोरण वगैरेंवर लिहिलेला बराच मजकूर स्पष्टपणे दिसतो. पण तो बहुधा ब्राम्ही लिपीत असल्यामुळे आपल्याला वाचता येत नाही आणि पाली भाषेत असल्यामुळे कळणारही नाही. पुरातत्व खात्याच्या दृष्टीने सांची हे फार महत्वाचे ठिकाण आहे. त्यांचे तज्ज्ञ या सगळ्यांचा सुसंगत अर्थ लावून त्यातून निष्कर्ष काढत असतात.

.... . . . . . . (क्रमशः)

सांचीचे स्तूप - भाग २


बौध्द धर्माच्या पुरातनकालीन परंपरेत स्तूप म्हणजे एक समाधी किंवा स्मारक असते. महात्मा गौतम बुध्दाचे महानिर्वाण ख्रिस्तजन्माच्या पाचशे वर्षे आधी होऊन गेले. तत्कालिन भारतीय परंपरेनुसार त्यांचेवर दाहसंस्कार करून त्यावर एक समाधी बांधली गेली. ती कदाचित स्तूपाच्या आकाराची असावी. त्यानंतर सुमारे तीन शतकांनी सम्राट अशोक याने बौध्द धर्माचा स्वीकार केला आणि त्याच्या प्रसाराचे काम हिरीरीने पुढे नेले. त्याने त्यापूर्वी केलेल्या निरनिराळ्या लढायांत प्रचंड मानवसंहार झाला होता. त्या पापातून मुक्त होऊन चौर्‍याऐंशीच्या फेर्‍यांतून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने बोधिसत्वाचे चौर्‍याऐंशी हजार स्तूप बांधले होते अशी आख्यायिका आमच्या मार्गदर्शकाने सांगितली. एकाच पुण्यात्म्याच्या अनेक जागी समाध्या असणे मी तर कधी ऐकले नाही. त्यात तीनशे वर्षापूर्वी होऊन गेलेल्या मानवाच्या पार्थिवाचे चौर्‍याऐंशी हजार भागात विभाजन करणे शक्यतेच्या कोटीतले वाटत नाही. त्यामुळे यात अतीशयोक्ती वाटली. चक्रवर्ती सम्राट अशोकाकडे सत्ता आणि समृध्दी या दोन्ही गोष्टी मुबलक असल्यामुळे त्याने गांवोगांवी भिक्खूंसाठी मठ बांधून दिले असतील आणि ते दुरूनही चटकन ओळखू यावेत यासाठी टेकड्या टेकड्यांवर स्मारकाच्या रूपात स्तूप उभे केले असण्याचीही शक्यता आहे. त्या कालातले सारेच बांधकाम दगड, माती, विटा वगैरेंपासून केलेले असल्यामुळे ते दोन हजार वर्षांच्या दीर्घ कालौघात वाहून गेले असणार. त्यातल्या त्यात सांची येथील काम आज जास्तीत जास्त सुस्थितीत दिसते, पण त्यामागे वेगळीच कारणे आहेत.

महात्मा गौतम बुध्दाचा जन्म आजच्या नेपाळमधील लुंबिनी या जागी झाला. राजकुमार सिध्दार्थ या नांवाने तो कपिलवस्तू या नगरात वाढला. राजवाड्यातील सुखी जीवनाचा त्याग करून सत्याचा शोध घेण्यासाठी तो अरण्यात गेला आणि बिहारमधल्या गया शहराजवळ बोधीवृक्षाखाली तपश्चर्या करतांना त्याला ज्ञानप्राप्ती झाली. आपल्या मतांचा प्रसार करण्यासाठी तो आजचा उत्तर प्रदेश, बिहार आणि नेपाळ या भागात पुढे आयुष्यभर भ्रमण करत राहिला. आजच्या मध्यप्रदेशातील सांची या गांवाला गौतमबुध्दाने कधीच भेट दिली नव्हती. मग त्याची समाधी किंवा एवढे मोठे स्मारक इथे कां बांधले गेले? या प्रश्नाचे एक कारण असे दिले जाते की सम्राट अशोकाच्या एका राणीचे माहेर नजीकच असलेल्या विदिशानगरीत होते. त्यामुळे त्याचा थोडा ओढा या बाजूला होता. हा भाग आर्थिक दृष्टीने समृध्द होता आणि विदिशा हे एक महत्वाचे शहर होते. मोठ्या शहराच्या जवळ पण उंच टेकडीवर असल्यामुळे त्यापासून थोडे अलिप्त अशी ही निसर्गरम्य जागा भिख्खूंना राहण्यासाठी आकर्षक होती. असा सर्व बाजूंनी विचार दूरदृष्टीने करून सम्राट अशोकांने या जागी फक्त एक स्तूपच बांधला नाही, तर बौध्द धर्माच्या अभ्यासाचे आणि प्रसाराचे एक प्रमुख केंद्र या जागी उभे केले.

देशभरातील शिकाऊ तसेच अनुभवी भिख्खू इथे येऊन रहात असत आणि प्रशिक्षण घेऊन तयारीनिशी धम्मप्रसारासाठी बाहेर पडत असत. यात हे केंद्र चांगल्या प्रकारे यशस्वी झाले आणि पुढील तेरा शतके त्याचा विकास अधून मधून होत राहिला. वेगवेगळ्या काळातल्या तत्कालिन राजांनी त्याच्या सौंदर्यात आणि समृध्दीत वेळोवेळी भर घातली. सम्राट अशोकाने बांधलेला मुख्य स्तूप फक्त विटांनी बांधलेला होता. कांही काळाने तो मोडकळीला आला. तेंव्हा त्याची डागडुजी करून त्याच्या सर्व बाजूंनी दगडी बांधकाम केले गेले. नंतर कोणी त्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी पुरुषभर उंच असा चौथरा सर्व बाजूंनी बांधून त्यावर चढण्याउतरण्यासाठी दगडी पायर्‍या बांधल्या. भारताचे सुवर्णयुग मानले जाणार्‍या गुप्तवंशाच्या राजवटीत अनेक सुंदर मूर्ती या परिसरात बसवल्या गेल्या. बौध्द धर्म परमेश्वराची मूर्तीपूजा मानत नाही. त्यांच्या मताप्रमाणे तो निर्गुण निराकार आहे. त्यामुळे परमेश्वराची कोणत्याही सगुण रूपातली प्रतिमा इथे दिसत नाही किंवा तिची पूजाअर्चा होत नाही, पण बुध्दाच्या मात्र अगणित रूपामधील प्रतिमा पहायला मिळतात. मुख्य स्तूप बांधून कांही शतके लोटल्यानंतर इतर स्तूप त्या जागी बांधले गेले, तसेच त्यांना आकर्षक अशी प्रवेशद्वारे बांधली गेली. सांचीच्या स्तूपामधील सर्वात सुंदर, अगदी अप्रतिम म्हणता येईल असा भाग म्हणजे स्तूपांच्या पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण दिशांना उभ्या केलेल्या कमानी किंवा तोरणे आहेत. इतके सुंदर प्रवेशद्वार आणि आत गेल्यावर पाहण्यासारखे विशेष असे कांहीच नाही असा अनुभव आपल्याला फार क्वचित येतो. या कमानींबद्दल सांगण्यासारखे खूप असल्यामुळे ते पुढील भागात देईन.

सम्राट अशोकाचे एकछत्र साम्राज्य लयाला गेल्यानंतर हा भाग कधी एकाद्या चक्रवर्ती सम्राटाच्या अधिपत्याखाली यायचा तर कधी स्थानिक राजेरजवाडे शिरजोर होत असत. त्यांच्या मर्जीनुसार कधी बौध्द धर्माला महत्व प्राप्त होत असे, तर कधी त्याचा राजाश्रय काढून घेतला जात असे. हा उतार चढाव तेरा शतके इतका प्रदीर्घ काळ चालल्यानंतर बहुधा बौध्द धर्मीयांनी या जागेला कायमचा रामराम ठोकला असावा. कारण अकराव्या शतकानंतरच्या काळातला एकही बौध्द धर्माशी संबंधित अवशेष येथील उत्खननात सापडला नाही. त्यानंतर इतर कोणीही या जागेचा सदुपयोग न केल्यामुळे ती पुढील सातआठ शतके पडून राहिली होती. मोठ्या स्तूपांची पडझड झाली होती, लहान लहान स्तूप दगडामातीच्या ढिगा-यांखाली गाडले गेले होते आणि सगळीकडे दाट झाडाझुडुपांची गर्दी झाली होती. भारतातील इतर कांही सौंदर्यस्थळांप्रमाणेच सांचीच्या प्राचीन स्तूपांचा नव्याने शोध एका इंग्रज अधिका-याने लावला.
..... . . . . . . (क्रमशः)

Sunday, June 28, 2009

सांचीचे स्तूप - भाग १


शाळेत शिकतांना इतिहास आणि भूगोल या दोन्ही विषयात सांचीबद्दल थोडेफार वाचनात आले होते, त्या भागातून रेल्वेने जातांना मुद्दाम लक्ष ठेऊन सांची स्टेशनजवळच असलेल्या टेकडीवरील त्या वास्तूच्या घुमटांचे दर्शन घेतले होते, पण मुद्दाम मुंबईहून इतक्या दूर खास तेवढ्यासाठी जाण्याएवढी तीव्र इच्छा मात्र कधी झाली नव्हती. विदिशाला जाण्याचा योग आला तेंव्हा मात्र सांची पाहूनच परत यायचे ठरवले.
उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उन वर येण्याच्या आधीच आम्ही घरातून निघालो आणि पंधरा वीस मिनिटात सांचीला पोचलो तोंवर ते अजून कोवळेच होते. विदिशाहून भोपाळकडे जाणार्‍या महामार्गावरून जातांना सांचीच्या स्तूपाकडे जाण्यासाठी एक फाटा फुटतो. त्या फाट्यावर वळताच लगेच पुरातत्वखात्याची चौकी लागली. तिथली तिकीटाची खिडकी उघडलेली होती. भारत, पाकिस्तान, ब्रह्मदेश, श्रीलंका, बांगलादेश वगैरे भरतखंडातल्या पर्यटकांसाठी माणशी दहा रुपये तिकीट आहे तर इतर देशातील नागरिकांसाठी त्याचा दर थेट अडीचशे रुपये इतका आहे असे तिथल्या फलकावर लिहिलेले होते. अमेरिकेत जन्मलेल्या आपल्या लहानग्या नातवाला सोबत आणले तर इतके पैसे द्यावे लागतील असा शेरा कोणी मारला, पण जगातल्या सगळ्याच लहान मुलांना इथे विनामूल्य प्रवेश असल्यामुळे सध्या तरी तशी वेळ आलेली नाही अशी दुरुस्ती केली गेली. दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांसाठी वेगवेगळे दर दाखवणारा तक्ता दिला होता, पण त्याची वसूली करणारा नगरपालिकेच्या कंत्राटदाराचा कर्मचारी अजून आला नसावा. तो वाहनतळावर बसला असेल असे समजून आम्ही आपली गाडी पुढे दामटली.
स्तूप ज्या टेकडीवर आहेत तिथपर्यंत वर चढण्यासाठी चांगला रस्ता आहे. वर गेल्यावर एक लहानसा पार्किंग लॉट होता. वीस पंचवीस गाड्या तिथे उभ्या राहू शकल्या असत्या. तिथे जागा नसली तर तिथे पोचण्याच्या रस्त्याच्या कडेने आणखी चाळीस पन्नास गाड्या उभ्या करता येतील. एकाच वेळी याहून जास्त संख्येने तिथे येणार्‍या वाहनांची संख्या कधी होत नसणार. रमत गमत वेळ घालवण्यासारखे हे ठिकाण नसल्यामुळे कोणीही तिथे तासभरसुध्दा रहात नसेल.
त्या दिवशीच्या पर्यटनाची बोणगी आम्हीच केली होती. त्यामुळे रस्त्यावरही कोणी भेटले नाही आणि पार्किंग लॉटही अगदी रिकामा होता. वाहनतळाच्या कडेला असलेल्या एका झाडाच्या सावलीला कार उभी करून आम्ही गेटपाशी गेलो. तिथली झाडलोट, राखणदारी वगैरे करणारे दोन तीन कर्मचारी गप्पा मारत बसले होते. आम्ही प्रवेश केल्यावर त्यातलाच एकजण माहिती द्यायला तयार झाला. त्याच्या बरोबर आम्ही समोरच असलेल्या मुख्य स्तूपाकडे वळलो.
यापूर्वी सारनाथला एकच भव्य आकाराचा स्तूप पाहिल्यासारखे मला आठवत होते आणि शाळेत असतांना पाहिलेल्या सांचीच्या चित्रांत एकच स्तूप असायचा. रेल्वेतून जातांनासुध्दा टेकडीच्या माथ्यावर असलेला एकच स्तूप पाहिला होता. प्रत्यक्षात ती टेकडी चढून वर गेल्यावर तिच्या शिखरस्तानी एक मोठा स्तूप आणि त्याच्या जवळच उतारावर दोन मध्यम आकाराचे स्तूप दिसले. लहान सहान अगणित स्तूपांचा तर सडा पडला होता. असे दृष्य पाहणे मला अगदी अनपेक्षित होते. एकमेकांच्या अगदी जवळ जवळ असलेल्या इतक्या स्तूपांचे कांही प्रयोजन वरवर तरी दिसत नव्हते.
लहानपणी स्तूपाचे चित्र पाहून ती एक वर्तुळाकृती इमारत असावी आणि तिच्या माथ्यावर अर्धगोलाच्या आकाराचा घुमट बांधलेला असावा असाच माझा समज झाला होता. अशा प्रकारचे घुमट अडीच हजार वर्षांपूर्वी कोणत्या तंत्राने बांधले गेले असतील आणि त्यांचा भार कशाच्या आधारावर तोलला जात असेल असे तांत्रिक स्वरूपाचे प्रश्न इंजिनियरिंग शिकल्यानंतर पडू लागले. शिवाय असे घुमट बांधण्याचे कौशल्य जर ख्रिस्तपूर्व युगात भारतीयांकडे होते तर ते मध्येच लुप्त होऊन पुन्हा इस्लामी राजवटीत कां प्रगट झाले असाही प्रश्न सतावू लागला. त्यांचे उत्तर सारनाथला मला मिळाले. तेथील स्तूपाला प्रदक्षिणा घालून पाहिली, पण कोठेच आत जाण्याचा दरवाजा दिसला नाही. आजूबाजूला कोणता भुयारी मार्गही सापडला नाही. अखेर चौकशी करता स्तूप ही इमारत नसून तो एक प्रकारचा बुरुज आहे असे समजले. आंतमध्ये दगडमातीचा ढिगारा रचून त्याला विवक्षित आकार देण्यासाटी बाहेरून भिंत बांधली होती. त्याला पोकळी नव्हतीच, त्यामुळे त्याच्या आंत प्रवेश करण्याचा प्रश्नच नव्हता. ही माहिती मला मिळालेली असल्यामुळे सांचीच्या स्तूपाकडे पाहतांनातिच्याकडे एक इमारत या नजरेने मी पाहिलेच नाही.
. . . . . . . . . . . (क्रमशः)

Saturday, June 27, 2009

तेथे कर माझे जुळती - ४ (उत्तरार्ध) - २

ऑफीसातल्या कामाच्या वाटणीची सोयीनुसार नेहमीच पुनर्रचना होत असते. अशा एका पुनर्रचनेत प्रकाश झेंडे त्यांच्या विभागासह माझ्या हाताखाली आले. तोपर्यंत मला सर्किट डायग्रॅम वाचता यायला लागले असले तरी मध्यंतरीच्या काळात इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रातल्या प्रगतीची प्रचंड घोडदौड चालली होती. संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला होता. यातल्या प्रमुख नवनव्या गोष्टींची ओळख करून घेण्यात मला झेंड्यांची खूप मदत झाली. सर्वात जास्त महत्वाच्या बाबी थोडक्यात पण नीट समजतील अशा पध्दतीने समजावून सांगण्यात त्यांची विलक्षण हातोटी होती. एका बाजूने पाहता त्यांचा कान माझ्या हातात होता, त्यामुळे त्यांच्याकडून घेतलेल्या माहितीवरून मी त्यांच्याच चुका काढणे शक्य होते हे त्यांना माहीत होते. तर दुस-या बाजूला त्यांच्या हाताखाली काम करणारी तरुण मुले जास्त आधुनिक शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन आलेली असल्यामुळे त्यांचेकडे अद्ययावत प्रणालींचे अधिक चांगले ज्ञान होते आणि मी त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कातसुध्दा होतो याची जाणीव त्यांना होती. तरीही कांहीही हातचे न राखता त्यांनी मला सगळे बारकावे व्यवस्थित दाखवले. एकादा पुरेसा सक्षम संगणक काय काय चमत्कार करू शकतो आणि इतर बाबतीत तो तितकाच मठ्ठ असल्यामुळे त्याचा उपयोग करण्यासाठी त्याला किती पढवावे लागते आणि तरीसुध्दा तो कसले गोंधळ घालू शकतो वगैरे गोष्टी त्यांनी मला छान समजावून सांगितल्या. पण हा सहवास जास्त दिवस टिकला नाही. आम्हा दोघांनाही वेगवेगळ्या विभागातल्या वरच्या जागांवर वेगवेगळ्या कामगिरींसाठी पाठवण्यात आले. त्यामुळे ऑफीसमधल्या गाठीभेटी बंद झाल्या. मात्र बाहेर आम्ही भेटत राहिलो.

एकदा कसल्याशा गाण्याच्या कार्यक्रमाच्या मध्यंतरात झेंडे आणि त्यांचे दोन तीन मित्र यांच्याबरोबर मी बोलत उभा होतो. म्हणजे ते लोक आपसात बोलत होते आणि मी आपला अधून मधून 'खरंच', 'व्वा', 'हो का' वगैरे उद्गार काढत नुसताच उभा होतो. अखेर स्थानापन्न होण्यासाठी सभागृहात परत येतायेता त्यातल्या एकाने " आता पुन्हा आपली भेट हितगुजमध्ये होणार आहेच." असे म्हंटले, त्याचा अर्थ कांही मला समजला नाही. त्या भागातल्या बहुतेक सर्व खाद्यगृहांना आणि सभागृहांना मी भेटी दिलेल्या असल्यामुळे हितगुज या नांवाचे चांगले हॉटेल किंवा हॉल तिथे नाही याची मला खात्री होती. "असेल कांहीतरी" म्हणून मी तो विषय त्या वेळी सोडून दिला, पण पुन्हा जेंव्हा झेंडे भेटले तेंव्हा मनातल्या कुतुहलाच्या किड्याने पुन्हा उचल खाल्ली आणि मी त्यांना त्यासंबंधी विचारून टाकले.
"तुम्हाला माहीत नाही कां? आम्ही मराठी मंडळी दर महिन्यातल्या पहिल्या रविवारी एकत्र बसून साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक समस्यांवर तासभर चर्चा करतो." त्यांनी सांगितले. यातल्या कुठल्याच 'सा' शी माझा कधी फारसा संबंध आला नव्हता आणि त्याविना माझे जीवन ठीकच चालले होते."हो कां? माझ्या कानांवर अजून हे आलेच नव्हते. कदाचित मला यात रस नसेल असे सगळ्यांना वाटले असेल." असे म्हणून मला तो विषय संपवायचा होता, पण झेंड्यांनी सांगितले," पुढच्या बैठकीला तुम्ही येऊन एकदा प्रत्यक्ष बघाच. तुम्हाला आवडेल."
मी नुसते तोंडदेखले 'हो' म्हंटले असले तरी त्यांनी पुढच्या बैठकीची सविस्तर माहिती दिली. अमक्या बिल्डिंगमधल्या तमक्यांच्या घरी ती मीटिंग असल्याचे सांगितले आणि पुढच्या महिन्यातल्या पहिल्या रविवारी संध्याकाळी सहा वाजता नक्की तिथे यायचा आग्रह धरला.
"अहो, पण मी त्यांना ओळखतसुध्दा नाही. त्यांच्या घरी अगांतुक पाहुणा म्हणून कसा येऊ?" मी शंका काढली. त्यावर त्यांनी लगेच उत्तर दिले,
"तिकडे मी असेनच ना? तुमची ओळख करून देईन. तसे बहुतेक लोक आपल्या परिचयातलेच आहेत. परवाच तर आपण पाटील, कुलकर्णी आणि देशपांड्यांशी बोलत होतो. ते सगळे नेहमी येतात. हितगुजमध्ये आम्ही खाणं पिणं ठेवलेलंच नाही, त्यामुळे तुम्हाला कसलाही संकोच वाटायचं कारण नाही."
आता माझ्यापाशी न जाण्याचे कारण उरले नव्हते. शिवाय माझे कुतूहल वाढले होते. त्यामुळे मी जायचे ठरवले. मीटिंगला आठवडाभर उरला असतांना झेंड्यांनी मला पुन्हा आठवण करून दिली आणि त्या दिवशी इतर कोणता प्रोग्रॅम ठरवायचा नाही अशी जवळजवळ आज्ञा केली. मीही कॅलेंडरवर त्या तारखेवर खूण करून ठेवली. पण मध्यंतरी कॅलेंडर बघण्यासाठी कांही काम पडले नाही तर त्या खुणा महिना संपल्यावर मागील महिन्याचे पान फाडतांनाच दिसतात असा अनुभव बरेच वेळा येतो. कदाचित या बाबतीतसुध्दा तसेच झालेही असते. पण झेंड्यांनी त्या दिवशी सकाळी पुन्हा आठवण करून दिल्यामुळे मी त्या बैठकीला गेलो. तिथले एकंदर वातावरण मला रुचले आणि शाळा सोडल्यानंतर अनेक वर्षांनी मी पुन्हा एकदा मराठी वाचनलेखनाकडे वळत गेलो आणि त्याची गोडी वाढत गेली. त्यानंतर दर महिन्याला नेमाने आमच्या भेटी होत राहिल्या. चर्चा हाच या बैठकींचा उद्देश असल्यामुळे मनमुराद चर्चा झाल्या. त्यातून झेंड्यांचे वाचन, त्यांच्या जीवनातले अनुभव, त्यावर त्यांनी केलेला विचार, यातून विकसित गेलेले त्यांचे बहुरंगी व्यक्तीमत्व या सगळ्यांची ओळख होत गेली.

सुमारे पांच सहा वर्षापूर्वी त्यांच्याच घरी झालेली हितगुजची बैठक अविस्मरणीय ठरली. त्यांचे वडील कृषीविज्ञानातले मोठे तज्ज्ञ होते. सेवानिवृत्तीनंतरसुध्दा ते अनेक कृषीविद्यापीठांना संशोधनकार्यात मार्गदर्शन करायचे. पंतनगरच्या भारतातल्या सर्वाधिक महत्वाच्या विश्वविद्यालयाने त्यांचा जीवनगौरव करून त्यांना मानपत्र आणि मानचिन्ह प्रदान केले होते. याची माहिती देऊन प्रकाश यांनी अत्यंत अभिमानाने त्या गोष्टी सर्वांना दाखवल्या. त्यानंतर एका खास आणि दुर्मिळ अशा ध्वनिफीतीचे सार्वजनिक श्रवण झाले. सात आठ वर्षांपूर्वी पोखरण येथे ज्या चांचण्या घेतल्या गेल्या होत्या त्यात सहभागी झालेल्या एका सैनिकी अधिका-याचा त्याच्या गांवी जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्याला उत्तर देतांना त्याने जे विस्तृत भाषण केले होते त्याची ध्वनिमुद्रित प्रत कोठून तरी झेंड्यांनी प्राप्त केली होती. अशा विषयात अत्यंत गुप्तता बाळगली जात असल्यामुळे त्यात कसल्याही प्रकारची तांत्रिक माहिती असणे शक्यच नव्हते, पण राजस्थानातल्या मरुभूमीवर भर उन्हाळ्यात रहायचा त्यांचा अनुभव चित्तथरारक होता. त्या काळात त्यांना आलेल्या इतर मजेदार अनुभवांच्या सुश्राव्य अशा कथनामुळे ते भाषण अत्यंत श्रवणीय होते.
या चांचणी प्रयोगाशी ज्यांचा प्रत्यक्ष किंवा अपरोक्षरीत्या संबंध आला होता अशा कांही व्यक्तींना या कार्यक्रमासाठी मुद्दाम पाचारण केले होते. बरेच वेळ आपण त्या गांवचेच नाही अशा मुद्रेने बसलेल्या लोकांना हळूहळू बोलते केल्यानंतर त्यांनीसुध्दा कांही हृदयस्पर्शी व्यक्तीगत अनुभव सांगितले. ही संस्मरणीय बैठक चांगली दोन अडीच तास रंगली होती. अखेर घरच्या लोकांचे चौकशी करणारे फोन येऊ लागल्यानंतर ती आटोपती घ्यावी लागली.
त्या बैठकीची आठवण ताजी होती. त्या निमित्याने झालेल्या चर्चेत झेंड्यांच्या व्यक्तित्वाचे अवगत नसलेले कांही पैलू समजले होते. याच्या आधी सुध्दा वेगवेगळ्या संदर्भात त्यांनी अनेक अजीबोगरीब अनुभव सांगितले होते. त्यांच्या समृध्द जीवनातल्या खूप कांही गोष्टी त्यांच्याकडून मला ऐकायच्या होत्या. त्यांच्याकडे सांगण्यासारखे खूप कांही होते आणि मुख्य म्हणजे ते सांगायची त्यांची तयारी असे आणि त्याचे मनोरंजक पध्दतीने कथन करणे त्यांना अवगत होते. त्यांच्यासह मोजक्या मंडळींना बरोबर घेऊन एकादी गिरिविहाराची सहल काढावी आणि त्यात मनसोक्त गप्पा मारून घ्याव्यात अशी माझी खूप इच्छा होती. पण देवाच्या मनात कांही वेगळेच होते. एका काळरात्री मला घाईघाईने एका आप्ताच्या अंत्ययात्रेला जावे लागले होते. ते काम आटोपेपर्यंत मध्यरात्र होऊन गेल्यामुळे तिथेच मुक्काम करून झुंजूमुंजू होताच मी घती परतलो. घरी येऊन पोचतो न पोचतो तोपर्यंत त्यांच्या एका जवळच्या मित्राचा फोन आला आणि त्याने धक्कादायक वर्तमान सांगितले, "प्रकाश आता आपल्यात राहिला नाही."