स्टार माझाने घेतलेल्या स्पर्धेत या वेळी या ब्लॉगचा समावेश रिमार्केबल पार्टिसिपेशन या यादीत केला आहे. म्हणजे उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले आहे. त्याबद्दल मी मला ज्यांनी ज्यांनी प्रोत्साहन दिले त्या सर्वांचा अत्यंत आभारी आहे. स्टार माझाने घेतलेल्या या स्पर्धेसंबंधी व्यक्त केलेले विचार आणि विजेत्यांची यादी खाली दिली आहे.
ऑसम! ‘ब्लॉग माझा-०९’ स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद, आशय, मांडणी, कल्पकता यांनी समृद्ध ब्लॉग पाहून पहिली प्रतिक्रिया हीच होती....ऑसम! मराठीत...भयंकर सुंदर! मराठी ब्लॉगॉस्फिअर केवळ आहेच असं नाही, तर ते विस्तारतंय, समृद्ध होतंय आणि त्याची व्याप्ती महाराष्ट्रातपुरताच नाही तर, जगभर आहे. हेच या स्पर्धेनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय.
मुंबई-पुणे, नगर, नागपूर ते बेंगलोर आणि यु.ए.ई ते यु.एस.ए अशा सर्व ठिकाणांहून या स्पर्धेसाठी प्रवेशिका आल्या. यात जसे नवखे ब्लॉगर आहेत, तसे मुरलेलेही. पंचविशी-तिशीचे आहेत, तसेच पासष्ठीचेही. अहो, मधुसुदन काळे यांचा www.sobati-vileparle.blogspot.com हा तर काही आजोबा मंडळींनी एकत्रितरित्या सुरू केलेला ब्लॉगही स्पर्धेसाठी आला. इतकंच काय, पण पोलिस, क्राईम यांना वाहिलेला, व्यंगचित्रांना वाहिलेला असेही ब्लॉग या स्पर्धेसाठी आले. म्हणजेच, मराठी ब्लॉगॉस्फिअर असं विविधतेनं नटलेलं आहे. व्यक्ती ते समष्टी सर्वांना सामावणारं असं हे ब्लॉग नावाचं माध्यम. मराठीच्या जागतिक पातळीवरील प्रसारासाठीही याचा मोठा उपयोग आहे. याचीच दखल घेऊन ‘स्टार माझा’नं ही खास मराठी ब्लॉगर्ससाठी ही स्पर्धा सुरू केली. यंदा या स्पर्धेचं दुसरं वर्ष आहे. मागील वर्षी प्रमाणेच या वेळीही संगणक तज्ज्ञ आणि लेखक अच्युत गोडबोले यांनी ब्लॉग्जच्या परिक्षणाचं अवघड काम आनंदानं स्वीकारलं. त्यांनी निवडलेल्या पहिल्या तीन आणि उत्तेजनार्थ दहा ब्लॉगर्स आणि त्यांच्या ब्लॉग्जना आम्ही प्रसिद्ध करत आहोत. दोन्ही कॅटेगरीजमध्ये क्रम महत्वाचा नाही.
तीन उत्कृष्ट ब्लॉग्ज
अनिकेत समुद्र http://manatale.wordpress.com
नीरजा पटवर्धन http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com
दिपक शिंदे http://bhunga.blogspot.com
उत्तेजनार्थ ब्लॉग्ज
हरिप्रसाद भालेराव www.chhota-don.blogspot.com
देवदत्त गाणार http://maajhianudini.blogspot.com/
मेधा सकपाळ www.medhasakpal.wordpress.com
सलील चौधरी www.netbhet.com
प्रमोद देव http://purvaanubhava.blogspot.com/
राज कुमार जैन http://rajkiranjain.blogspot.com
मिनानाथ धसके http://minanath.blogspot.com
विजयसिंह होलाम http://policenama.blogspot.com
दिपक कुलकर्णी http://aschkaahitri.blogspot.com/
आनंद घारे http://anandghan.blogspot.com
सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन! आणि हो, ज्यांचे ब्लॉग्ज या स्पर्धेत निवडले जाऊ शकले नाहीत, त्यांनी प्लीज प्लीज प्लीज आपले ब्लॉगिंग व्रत सोडू नये. कारण, पुढच्या वर्षी पुन्हा आहेच ‘स्टार माझा’ची स्पर्धा...... ‘ब्लॉग माझा’!!
चांगभलं!
बाकीच्या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि स्टार माझा, श्री अच्युत गोडबोले आणि श्री.प्रसन्न जोशी यांचे मनःपूर्वक आभार
Friday, November 20, 2009
Thursday, November 19, 2009
अमेरिकेची लघुसहल - तिसरा दिवस - ३

अमेरिकेची लघुसहल - तिसरा दिवस - ३ - वॉशिंग्टन डीसी - ३
कॅपिटॉल बिल्डिंगसमोरील वॉशिंग्टन मेमोरियलच्या दिशेने पसरलेल्या प्रशस्त जागेला नॅशनल मॉल असे दिले आहे. विविध प्रकारची अनेक संग्रहालये आणि इतर महत्वाच्या वास्तू या वरील हमरस्त्याच्या दोन्ही बाजूंना ऊभ्या केलेल्या आहेत. या मॉलच्याच वॉशिंग्टन स्मारकाच्या पलीकडल्या बाजूला एक लांबलचक रिफ्लेक्टिंग पाँड आहे आणि त्याच्या पलीकडे लिंकन मेमोरियल आहे. अशा प्रकारे हे स्मारक, वॉशिंग्टन मॉन्यूमेंट आणि कॅपिटाल या तीन्ही मुख्य इमारती एका रांगेत आहेत आणि त्यांच्या मध्ये अडथळा आणणारी कोणतीही वास्तू नसल्याने मॉलवरून त्या तीन्ही दिसत राहतात.
अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांना मानवी हक्कांसाठी लढा देणा-या महानुभावांच्या यादीत खूप वरचे स्थान आहे. ब्रिटीशांच्या जोखडातून अमेरिका मुक्त झाल्यानंतरसुध्दा गुलामगिरीची पध्दत त्या देशात अस्तित्वात होती आणि मुख्यतः आफ्रिकन वंशाच्या लोकांना गुलामीच्या अवस्थेत अनन्वित जुलूम सहन करावे लागत असत. अब्राहम लिंकन हे जन्माने गौरवर्णीय असले तरी त्यांना ही अमानुष गुलामगिरी मान्य नव्हती. त्यांनी त्याविरुध्द लढा दिला आणि विरोधकांबरोबर अक्षरशः युध्द पुकारून त्यांना नामोहरम केले आणि गुलामगिरीच्या प्रथेचे अमेरिकेतून उच्चाटन केले.
अशा या महात्म्याचे संस्मरणीय असे स्मारक बांधायचा विचार सन १८६७ पासूनच सुरू झाला होता, पण १९११ साली त्याला अमेरिकन काँग्रेसची मंजूरी मिळाली (काँग्रेस हा अमेरिकेतला एक राजकीय पक्ष नसून तिथली लोकसभा त्या नांवाने ओळखली जाते) आणि १९१४ मध्ये त्याचे बांधकाम सुरू होऊन ते १९२२ पर्यंत पूर्ण झाले. ग्रीक डोरिक टेंपलच्या धर्तीवर बांधलेल्या या इमारतीला ३६ खांब आहेत आणि त्यांच्या आधाराने सपाट आकाराचे छप्पर आहे. वेगवेगळ्या अमेरिकन संस्थानांची नांवे यातील प्रत्येक खांबावर खोदलेली आहेत आणि उरलेली नांवे वेगळ्याने एका फलकावर दिली आहेत. ही संपूर्ण इमारत पांढ-या शुभ्र संगमरवरी दगडांपासून बांधलेली आहे.
पाय-या चढून इमारतीत गेल्यानंतर समोर अब्राहम लिंकन यांचा भव्य पुतळा आहे. तसा तो अगदी दूरवरून दिसतच असतो. जवळ जाता जाता त्याची भव्यता आणि लिंकनच्या मुद्रेवरील भाव स्पष्ट होत जातात. " ज्या लोकांसाठी अब्राहम लिंकन यांनी आपल्या राष्ट्राची अखंडता टिकवून ठेवली त्यांच्या हृदयात आणि या मंदिरात त्यांची आठवण सतत तेवत राहील." असे शब्द या पुतळ्याच्या वरच्या बाजूला ठळक अक्षरात कोरून ठेवले आहेत. दोन्ही हात बाजूच्या हँडरेस्टवर टेकवून ऐटीत खुर्चीवर विराजमान असलेली लिंकन यांची सुटाबुटातली प्रतिमा विलक्षण लक्षवेधक आहे. सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने पहाता त्यांची गणना कांही देखण्यांमध्ये होणार नाही. पण त्या पुतळ्याचा आकार, रेखीवपणा, समोरील वॉशिंग्टन स्मारक आणि कॅपिटांलच्या दिशेला वळवलेली करडी नजर वगैरे सारे पाहण्यासारखे आहे. लिंकन यांनी केलेल्या कांही महत्वाच्या भाषणांमधले उतारे दोन्ही बाजूंच्या भिंतींवर कोरून ठेवले आहेत.
लिंकन मेमोरियलच्या जागेवर अमेरिकेच्या इतिहासातल्या कांही ठळक घटना घडल्या आहेत. लिंकन यांच्यानंतरचे सर्वात प्रसिध्द मानवतावादी मार्टिन ल्यूथर किंग यांनी सन १९६३ मध्ये आपल्या सिव्हिल राइट्स मूव्हमेंटमधून जवळ जवळ अडीच लाख लोकांचा मोर्चा वॉशिंग्टनला नेला होता आणि "माझे एक स्वप्न आहे...." अशी सुरुवात करून केलेले भाषण अजरामर झाले आहे. "होंगे कामयाब.." ही त्यांनी दिलेली घोषणा जगभर प्रसिध्द झाली आणि तिचे प्रतिसाद उमटत राहिले. या वर्षाच्या सुरुवातीला लिंकनच्या या पुतळ्याच्या समोरच असलेल्या कॅपिटॉलच्या प्रांगणात सध्याचे अध्यक्ष बरॅक ओबामा यांनी दिवंगत नेते लिंकन यांच्या साक्षीने शपथविधी घेतांना जे भाषण केले तेंव्हा त्यांचा कंठ भावनेने भरून आला होता.
वॉशिंग्टन मॉन्यूमेंटपाशी उभे राहून नॅशनल मॉलच्या काटकोनात पाहिले तर एका बाजूला दूर व्हाइट हाउस दिसते. दुस-या बाजूला टाइडल बेसिन नांवाचा एक तलाव आहे. त्या तळ्याच्या पलीकडे ्सलेल्या मोकळ्या जागेत थॉमस जेफरसन यांचे भव्य स्मारक बांधले आहे. याचे काम सन १९३९ साली सुरू झाले आणि १९४३ पर्यंत पूर्ण झाले. त्यामध्ये राष्ट्राध्यक्ष जेफरसन यांचा ब्राँझचा पुतळा सन १९४७ मध्ये बसवला आहे.
थॉमस जेफरसन हे अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष होऊन गेले. ते जॉर्ज वॉशिंग्टन यांचे सहकारी होते. वॉशिंग्टन यांनी लढाईचे नेतृत्व करून ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवले होते ते अमेरिकेच्या नागरिकांसाठी मिळवले होते. त्या वेळी जाहीर केलेला स्वातंत्र्याचा जाहीरनामा मुख्यतः जेफरसन यांनी तयार केला होता. ते एक विद्वान आणि महान विचारवंत होते. हे लोकांसाठी, लोकांनी चालवलेले राज्य नेमके कसे चालवावे यासाठी योग्य अशी घटना बनवण्याचे काम थॉमस जेफरसन यांनी केले. त्यांना अमेरिकेचे फाउंडिंग फादर म्हणजे एका अर्थाने राष्ट्रपिता म्हंटले जाते. अमेरिकेच्या लोकशाहीचा भक्कम पाया जेफरसन यांनी घातला होता, त्याच आधारावर तो आजवर उभा आहे.
जेफरसन मेमोरियल ही सुध्दा एक प्रेक्षणीय इमारत आहे. गोलाकारात बांधलेल्या खूप पाय-या चढून वर गेल्यानंतर रांगेने उभ्या उंच खांबांवर आधारलेले प्रशस्त द्वार लागते. आंत प्रवेश करताच समोरच एका वर्तुळाकृती दालनात जेफरसन यांचा एकोणीस फूट उंच भव्य असा ब्राँझचा पुतळा उभारलेला आहे. दोन्ही बाजूच्या वर्तुळाकृती भिंतींवर अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यातील आमि इतर संदर्भावरून घेतलेली जेफरसन यांची सुवचने मोठ्या अक्षरात कोरली आहेत. छपरावरील घुमट या इमारतीची शोभा वाढवतो. जुन्या ऐतिहासिक पध्दतीच्या वास्तुशिल्पात नव्या काळातील कल्पनांची मिसळ करून आधुनिक तंत्राने बनवलेल्या या इमारतीत नव्याजुन्या शैलींचा संगम दिसतो. समोर विस्तीर्ण तलाव आणि आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याने ही वास्तू जास्तच उठून दिसते.
. . . . . . . . . . (क्रमशः)
Tuesday, November 17, 2009
अमेरिकेची लघुसहल - तिसरा दिवस - २

अमेरिकेची लघुसहल - तिसरा दिवस - २ - वॉशिंग्टन डीसी - २
अमेरिकेतील उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील, पण दोन्हीकडील प्रामुख्याने पूर्व किना-यावरील, संस्थानांच्या संमतीने पोटोमॅक नदीच्या किना-यावरील या जागी त्या नव्या राष्ट्राची राजधानी वसवण्याचे सन १७९० साली ठरवले गेले. मेरीलँड आणि व्हर्जीनिया राज्यांच्या सीमेवरला आणि दोन्ही राज्यातला थोडा थोडा मिळून १० चौरस मैलाएवढा जमीनीचा भाग या कामाकरता निश्चित झाला आणि व्हाइटहाउस या इमारतीची कोनशिला १७९० मध्ये बसवली गेली. अमेरिकेच्या केंद्र सरकारच्या मालकीची ही सर्वात जुनी इमारत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुरुवातीची कांही वर्षे त्या देशाचा कारभार फिलाडेल्फिया शहरातून चालवला जात असे. सन १८०९ मध्ये कॅपिटॉलच्या सिनेट चेंबरचे बांधकाम पुरे झाल्यानंतर अमेरिकेची काँग्रेस तिथे भरू लागली. त्यानंतर राजधानीचा विकास जोमात सुरू झाला होता, पण १८१२ मध्ये ब्रिटीशांनी केलेल्या हल्ल्यात त्यातील बहुतेक इमारती जळून खाक झाल्या. युध्द संपल्यानंतर पुन्हा नव्याने बांधणी सुरू होऊन ती १८२९ पर्यंत पूर्ण झाली. १८४८ मध्ये तत्कालीन तंत्रज्ञानानुसार अतिभव्य अशा वॉशिंग्टन स्मारकाचे काम सुरू झाले होते, पण कांही तांत्रिक अडचणी आणि राजकीय कारणांमुळे ते कांही काळानंतर बंद पडले. तीस वर्षांनंतर ते पुन्हा जोमाने चालू झाले आणि १८८५ मध्ये त्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. नंतरच्या काळात प्रेसिडेंट लिंकन आणि प्रेसिडेंट जेफरसन या दोन महान विभूतींची स्मारके बांधण्यात आली. तसेच या मुख्य इमारतींच्या मधल्या जागेत बगीचे, तलाव, हमरस्ते वगैरे गोष्टी अत्यंत योजनापूर्वक रीतीने तयार करण्यात आले आणि त्या भागात अनेक सुंदर इमारतींची उभारणी करण्यात आली. मधोमध वॉशिंग्टन स्मारकाचा उंच स्तंभ आणि त्याच्या चार दिशांना पण दूरवर असलेल्या चार प्रमुख इमारती हा वॉशिंग्टन शहराचा मुख्य आराखडा शंभर दीडशे वर्षांपूर्वी तयार झाला होता. त्यांच्या आजूबाजूंच्या इतर इमारती नंतरच्या काळात काळानुसार विकसित होत गेलेल्या पध्दतीनुसार बांधल्या गेल्या, पण या पांच ऐतिहासिक इमारतींच्या सौंदर्याला बाधा येईल असे कोणतेही बांधकाम नंतर केले गेलेले नाही. अमेरिकेतील इतर सर्वच महानगरात दिसते तशी अवाढव्य पण सरळसोट गगनचुंबी इमारतींची गर्दी या शहरात नाही. वॉशिंग्टन स्मारक आणि कॅपिटॉल बिल्डिंगचे शिखर या दोन्हींची उंची जवळजवळ समान आहे आणि तिसरी कोणतीही इमारत इतकी उंच नाही. या पांच प्रमुख स्थळांना जोडणारा एकादा रिंग रोड दिसला नाही. कोणत्या क्रमाने त्यांना भेट द्यायची यालाही कांही महत्व नव्हते. टूर ऑपरेटरने त्याच्या सोयीनुसार सगळीकडे फिरवून आणले.
वॉशिंग्टन मॉन्युमेंट ही एक प्राचीन काळातल्या युरोपीय पध्दतीतील ओबेलिस्क प्रकारची इमारत आहे. हा एक प्रकारचा चौकोनी खांब असतो आमि तो वरच्या बाजीने निमूळता होत जातो. पूर्वीच्या काळात अशा आकाराचे शिलाखंड घडवून ते वाहून नेत आणि शोभेची वस्तू म्हणून सार्वजनिक ठिकाणी उभे करत असत. वॉशिंग्टन मॉन्यूमेंट मात्र संगमरवर, ग्रॅनाइट आणि सँडस्टोन या जातींच्या दगडांमधून उभारले आहे. तो जगातील सर्वात मोठ्या आकाराचा प्रचंड ओबेलिस्क आहे, तसेच जगातील सर्वात उंच दगडी बांधकाम आहे. तसेच पॅरिसचा आयफेल टॉवर उभा होण्यापूर्वीची कांही वर्षे ही जगातील सर्वात उंच इमारत होती. सुमारे ५५५ फूट उंचीचा हा मनोरा एकाद्या ५५ मजली इमारतीइतका उंच आहे. आजकाल यापेक्षा उंच इमारती अमेरिकेच्याच नव्हे तर युरोपातील आणि मलेशिया, दुबई यासारख्या देशातल्या सुध्दा अनेक शहरांमध्ये पहायला मिळतात, पण त्या सिमेंटकाँक्रीटच्या असतात. वॉशिंग्टन मेमोरियल आंतून पोकळ असून त्यात साडेआठशे पाय-यांचा जिना आहे, तसेच लिफ्टची सोयसुध्दा आहे. आम्हाला मात्र कदाचित वेळेअभावी असेल पण वर जाऊन आजूबाजूचा पंचवीस तीस मैलावर पसरलेला भाग पहाण्याची संधी मिळाली नाही. ११-७ च्या घटनेनंतर आंत जायला मनाई करण्यात आली आहे असे कांहीसे सांगितले गेले. त्यातले खरे खोटे कोण जाणे. मॉन्यूमेंटच्या सभोवती प्रशस्त हिरवळ आहे आणि त्यात फुलांचे सुंदर ताटवे लावलेले दिसत होते. त्यांच्या पलीकडे दूर उभे राहूनच आम्ही या स्मारकाचे दर्शन घेतले. कुतुबमीनार आणि पिसा येथील कलत्या मनो-याला प्रत्येक मजल्यावर सुरेखसा सज्जा आहे आणि कलाकुसर केलेले खांब व कमानी यांनी ते नटलेले आहेत. तशा प्रकारची सौंदर्यनिर्मिती वॉशिंग्टन मॉन्यूमेंटमध्ये दिसत नाही. आजूबाजूला सगळी सपाट जमीन आणि मध्येच एक गगनचुंबी सरळसोट उभा उंचच उंच मनोरा पाहून जॉर्ज वॉशिंग्टनच्या उत्तुंग व्यक्तीमत्वाची आठवण येऊन मन दडपून जावे आणि आपल्या खुजेपणाची जाणीव व्हावी असा उद्देश हे भव्य स्मारक बांधण्यामागे असावा. आमच्या बसमध्ये बहुतेककरून परदेशी पर्यटक होते. त्या सर्वांना, विशेषतः बहुसंख्येने असलेल्या चिनी लोकांना अमेरिकेचे स्वातंत्र्ययुध्द आणि त्याचे नेतृत्व करून सर्व जगातील स्वातंत्र्यप्रेमी लोकांना स्फुरण देणारा जॉर्ज वॉशिंग्टन या दोहोंबद्दल किती माहिती असेल किंवा कितपत आत्मीयता वाटत असेल याची शंकाच होती. ते आपले इकडे तिकडे पहात आपल्या कॅमे-याने दिसेल ते टिपण्यात मग्न दिसत होते.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेले व्हाइटहाउस पाहून खरे सांगायचे झाले तर माझी थोडी निराशाच झाली. एक तर सुरक्षेच्या कारणामुळे आम्हाला त्या इमारतीच्या गेटपर्यंतसुध्दा नेले नाही. मध्ये दोन तीन रस्ते सोडून लांबवर असलेल्या एका रस्त्यावर उभे राहून दुरूनच ती पहावी लागली. आजूबाजूला असलेल्या उंच झाडांमागे तिचा बराचसा भाग झाकलेलाच होता आणि जेवढा दिसत होता तो फारसा आकर्षक वाटला नाही. शंभर दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटीश शासकांनी बांधलेले आणि आता पारशी किंवा गुजराती शेठांच्या ताब्यात असलेले कांही बंगले मुंबई, दिल्ली, कोलकाता वगैरे शहरांच्या जुन्या भागात दिसतात, तशातलाच एक ब-यापैकी मोठा आणि व्यवस्थित रंगरंगोटी करून चांगल्या वापरात ठेवलेला एकादा बंगला जसा दिसेल तसा हा बंगला वाटला. त्या मानाने आपले दिल्लीचे राष्ट्रपतीभवन किती तरी भव्य आणि सुंदर दिसते. अर्थात व्हाइटहाउस ही अमेरिकेतली एक सर्वात जुनीपुराणी इमारत आहे आणि बांधायच्या वेळीच एकादे चर्च किंवा स्मारक म्हणून ती बांधलेली नसून माणसांच्या वास्तव्याचा विचार करून बांधली आहे हे लक्षात घ्यायला हवे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणजे आजच्या जगातला सर्वाधिक प्रभावशाली राजकारणी पुरुष त्या वास्तूत निवास करतो या कारणामुळे तिला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. पण तिथला एकादा व्हरांडासुध्दा जवळून पहायला मिळणार नसल्यामुळे त्या इमारतीत एकंदर किती खोल्या आहेत किंवा किती स्क्वेअरफूट बिल्टअप व कार्पेट एरिया आहे असली माहिती जाणून घेण्यात कोणालाच फारसे स्वारस्य नव्हते.
. . . .. . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)
Wednesday, November 11, 2009
अमेरिकेची लघुसहल - तिसरा दिवस - १

अमेरिकेची लघुसहल - तिसरा दिवस - १ - वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेच्या लघुसहलीच्या दुस-या दिवशी सकाळी नायगाराच्या धबधब्याच्या परिसरात भरपूर वेळ घालवून आणि दुपारी कॉर्निंग ग्लास म्यूजियम पाहून झाल्यानंतर रात्रीच्या मुक्कामाला आम्ही मेरीलँड राज्यामधल्या एका गांवी मुक्कामाला जाऊन पोचलो. तिसरे दिवशी सकाळी उठून लगेच पुढल्या प्रवासाला लागायचे होते. आम्ही ज्या हॉटेलात उतरलो होतो, तिथल्या खोलीतल्या छोट्याशा स्वच्छतागृहात व्यवस्थितपणे उभे राहून कपडे बदलण्याइतकीसुध्दा जागा नव्हती, हवेत चांगलाच गारठा होता आणि वेळही नव्हता, त्यामुळे स्नान वगैरे करायचा विचारही मनात आला नाही. या पँकेजमध्ये नाश्त्याचा अंतर्भाव नव्हताच. खोलीत ठेवलेल्या किटलीत पाणी उकळून कॉपी करून ती बिस्किटांच्या सोबतीने प्यालो आणि आंघोळीच्या गोळ्या घेऊन बसमध्ये जाऊन बसलो. उजाडतांच आमची बस वॉशिंग्टन डीसीच्या मार्गाला लागलीसुध्दा. देशाची राजधानी असल्यामुळे तिथे अनेक सरकारी कार्यालये आहेत, तसेच पर्यटकांसाठी खूप प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यामुळे त्या ऑफीसात काम करणारे नोकर, तिथे आपापली कामे करवून घेण्यासाठी येणारे नागरिक, ते शहर पहायला येणारे टूरिस्ट आणि या सर्वांना विविध सेवा उपलब्ध करून देणारे व्यावसायिक अशा सगळ्या लोकांचीच सकाळ होताच वॉशिंग्टन डीसी कडे जाण्यासाटी धडपड सुरू होते. त्या शहराच्या दिशेने जाणारे सारे रस्ते वाहनांनी दुथडी वाहू लागतात. ही गर्दी टाळण्यासाठी आम्ही शक्य तितके लवकर निघालो होतो. तरीसुध्दा शहराच्या जवळ जाता जाता गर्दीचा मुरंबा (ट्रॅफिक जॅम) सुरू झाला आणि तो दाट होत गेला. अमेरिकेतल्या सगळ्याच मोठ्या शहरात अनेक उड्डाणपूल आणि भुयारी रस्ते बांधून ट्रॅफिक सिग्नल टाळण्यात आले असल्यामुळे वाहतूक सहसा बंद पडत नाही, पण वाहनांची संख्या फार जास्त झाल्यामुळे त्याची गती मात्र मंदावते. हळूहळू पुढे सरकता सरकता दुरूनच वॉशिंग्टन मेमोरियलचा उंच मनोरा दृष्टीला पडला आणि सर्वांना हायसे वाटले.
वॉशिंग्टन डीसी इथे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांची राजधानी आहे एवढे तरी जगातील सर्वच सुशिक्षित लोकांना माहीत असते. अमेरिकेच्या पश्चिम किना-यावर वॉशिंग्टन नांवाचे एक राज्य आहे. त्याच्या नांवाबरोबर गल्लत होऊ नये म्हणून नेहमी 'वॉशिंग्टन डीसी' असा उल्लेख केला जातो. बहुतेक अमेरिकन लोक तर फक्त 'डीसी' एवढेच म्हणतात. अमेरिका (म्हणजे यूएसए) हे आजच्या जगातले सर्वाधिक बलशाली राष्ट्र आहे. त्यामुळे जगातील कोणत्याही देशाच्या कारभारात हस्तक्षेप करायचा त्याला हक्क आहे अशी एक समजूत आहे. पूर्वीच्या काळातले बलिष्ठ सम्राट, ताकतवान बादशहा वगैरे लोक इतर राज्यांवर सरळ सरळ आक्रमण करीत आणि जिंकलेल्या देशाचा खजिना लुटून आणत असत. तो राजा शरण आला आणि त्याने गयावया केली तर त्याच्याकडून जबरदस्त खंडणी वसूल केली जात असे. आजकाल तसे करत नाहीत. मोठे देश लहान देशांना शस्त्रास्त्रे, यंत्रसामुग्री वगैरे विकत घ्यायला लावतात आणि ते पुरवणा-या कंपन्यांकडून कररूपाने पैसे गोळा करतात. त्यामुळे तिथली सरकारे प्रत्यक्ष खंडणी वसूल करत नसली तरी जगभरातून संपत्तीचा ओघ त्या दिशेने वहात असतो. अमेरिकेच्या राष्ट्रीय धोरणांचा परिणाम जगभरातल्या इतर मित्र किंवा शत्रूराष्ट्रांच्या तसेच तटस्थ राष्ट्रांच्याही धोरणावर होत असतो. इतकेच नव्हे तर अमेरिकेच्या अंतर्गत कारभारामुळे तिथल्या बाजारावर त्याचा प्रभाव पडला तर त्याचे पडसाद जगभरातील बाजारांत उमटतात. अशा कारणांमुळे वॉशिंग्टन डीसी ही एका अर्थाने सध्याच्या जगाचीच राजधानी झाली आहे, निदान ती राजकीय दृष्ट्या जगाच्या केंद्रस्थानी आहे असे म्हणता येईल.
शेती, व्यापार, कारखानदारी वगैरे उद्योग व्यवसाय अमेरिकेत पहिल्यापासून पूर्णपणे खाजगी मालकीचेच आहेत. ते हातात घेण्याचा प्रयोग तिथल्या सरकारने कधी करून पाहिला नाही. रस्ते बांधणी, रेल्वेमार्ग उभारणे आणि त्यावर धांवणा-या मोटारगाड्या, ट्रेन्स, इतकेच नव्हे तर आकाशात उडणारी विमाने आणि पाण्यातल्या आगबोटी वगैरे नागरी वाहतूकीची सारी साधने, तसेच शिक्षण, मनोरंजन आदि बहुतेक गोष्टी खाजगी क्षेत्रात आहेत. इतकेच नव्हे तर शस्त्रास्त्रे, लढाऊ विमाने आणि अग्निबाणसुध्दा खाजगी क्षेत्रात असलेल्या कारखान्यांत तयार होतात. राज्य सरकारांना बरीच स्वायत्तता असून कायदा आणि सुव्यवस्था, न्यायसंस्था वगैरे खाती त्यांच्या अखत्यारीत येतात. अर्थ, परराष्ट्रसंबंध आणि संरक्षण अशी मोजकीच क्षेत्रे केंद्र सरकारकडे आहेत. त्यातली परराष्ट्रसंबंध आणि संरक्षण ही फक्त खर्चाचीच आणि चांगलीच खर्चिक खाती आहेत आणि त्यांचा खर्च चालवण्यासाठी कररूपाने निधी गोळा करणे हे केंद्र सरकारचे मुख्य काम समजले जाते.
अमेरिकेतील उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील संस्थानांना सोयिस्कर अशा ठिकाणची ही जागा प्रत्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टननेच राजधानीसाठी निवडली होती. त्या जागेवर अमेरिकेच्या राजधानीचे हे शहर तत्कालिन प्रसिध्द वास्तुविशारदाच्या देखरेखीखाली अत्यंत व्यवस्थितपणे नियोजन करून वसवले गेले आहे. या शहरात सुंदर इमारती, विस्तीर्ण उद्याने, त-हेत-हेची वस्तुसंग्रहालये, स्मृतीस्थाने वगैरेंची नुसती रेलचेल आहे. गेल्या दोन शतकांमधील वास्तुकलेचे उत्तमोत्तम नमूने इथे पहायला मिळतात. जिकडे नजर जाईल तिकडे कांही तरी सौंदर्यच पहायला मिळेल असे वाटत राहते.
. . . . . . . . . (क्रमशः)
Friday, November 06, 2009
स्वाक्षरी संदेश
आमच्या सखाराम गटण्याच्या खिशात नेहमी एक लहानशी वही असायची. त्याच्या शाळेत कोणताही साहित्यिक पाहुणा आला की त्याला गांठून आणि त्यांच्याकडून एक संदेश आणि स्वाक्षरी मिळवून तो आपल्या संग्रहात भर टाकत असे. एकदा भाईकाकांनी दिलेल्या एका संदेशामुळे त्याच्या जीवनाचे वारू थोडे भरकटले होते आणि त्यांनीच त्याला छानशी पुस्ती जोडल्यावर ते मार्गी लागले याची चित्तरकथा सगळ्या मिसळपाव प्रेमींना माहीत (कदाचित तोंडपाठसुध्दा) असेल. पुढे सखारामाच्या पोराबाळांच्या संसारात ती वही गहाळ झाल्याचे ऐकले आणि आपण अशी एक वही बाळगावी अशी मनातली सुप्त इच्छा उफाळून वर आली. पण आता मला शाळेत प्रवेश द्यायला कोणी तयार होईना आणि मी लुब्र्यासारखा शाळेच्या फाटकापाशी ताटकळत उभा राहिलो तरी आताची लेखकूमंडळी अमेरिकेपासून इंडोनेशियापर्यंत चहूबाजूला दूरवर पांगली असल्यामुळे त्यांना आमच्या गांवातल्या शाळेला भेट द्यायला जमेल असे वाटेना. म्हणून मीच त्यांच्या ई-अड्ड्यांना भेट देऊन कांही मिळते कां ते पहायचे ठरवले. मिसळपावाचे हॉटेल हा सध्याचा अतीशय गजबजलेला अड्डा असल्याचे कांनावर आल्यामुळे इथूनच सुरुवात केली. कांही स्वाक्षरीसंदेश दुसरीकडे मिळाले.
या अड्ड्यांवर येणारी थोडी मंडळी स्वतःच्या ख-या नांवाने वावरत असावीत. म्हणजे मी कांही त्यांची फोटो आयडेंटिटीज वगैरे पाहिलेली नाहीत, पण तशा प्रकारची नांवे कधीतरी वाचनात किंवा ऐकण्यात येतात. त्यातल्या दोन तीन लोकांना प्रत्यक्ष भेटण्याचा योगही आला आणि ती त्याच नांवांची खरीखुरी माणसे असल्य़ाची खात्री पटली. पण इतरांबद्दल तसे सांगता येणार नाही. कधीही न ऐकलेली अफलातून नांवे मुलांना ठेवायची रुढी आजकाल पडत असली तरी मिपाच्या कट्ट्यावर दिसणारी कांही नांवे आपल्या मुलांना ठेवायला कोणतेही सूज्ञ आईवडील धजावतील असे वाटत नाही. त्यामुळे त्या सदस्यांनी स्वतःच ते बुरखे पांघरलेले असावेत असे दिसते. कांही सदस्य एक बुरखा पांघरून लिहीत असले तरी अधून मधून त्यातून बाहेर येऊन आपल्या एकाद्या टोपणनांवाने प्रतिसाद देतांना दिसतात. त्यामुळे त्यांचे नांव पुन्हा गुलदस्त्यातच राहते.
तसे पहायला गेल्यास "नांवात काय आहे" असे चारशे वर्षांपूर्वी कोणी साहेब सांगून गेला आणि आजही बरेच लोक तेच वाक्य उच्चारत असतात या अर्थी त्यात कांही तथ्य असावे. त्यामुळे कुठल्या नावाने कोणी सही केली आहे इकडे फार लक्ष न देता त्यांनी स्वाक्षरीबरोबर दिलेले संदेश तेवढेच गोळा करायचा एक अल्पसा प्रयत्न मी केला आहे. यातले कांही लोक एका ओळीच्या चर्चाप्रस्तावावर पानभर लिहून खाली आपली संदेशपूर्ण सही करतात, तर कांहीजण पानभर लांबीच्या लेखाला "वाः", "मस्त", "जियो", "+१", "?", "!", "." असे गर्भित अर्थपूर्ण प्रतिसाद देऊन खाली दोन ओळींचा संदेश देतात. मी त्यांच्यात भेदाभेद केला नाही. संदेश गोळा करतांना वर लिहिलेला मजकूर सविस्तर वाचायला वेळ तरी कसा मिळणार म्हणा. माझ्या या संशोधनाला कोणी प्रायोजक न मिळाल्यामुळे मी आपल्या कुवतीनुसार फक्त एक लहानसा सँपलसर्व्हे केला आहे. ज्या सदस्यांचे महान संदेश यात आले नाहीत त्यांनी कृपया राग मानू नये. तसेच ज्यांचे संदेश मी घेतले आहेत त्यांनी सुध्दा मनात राग न आणता मी केलेल्या अडाणीपणाच्या टिप्पणीवर (वाटल्यास) हंसून घ्यावे अशी त्यांना नम्र विनंती आहे. हे संदेश मी संकेतस्थळावरून जसेच्या तसे उचलले असल्यामुळे त्यातल्या व्याकरणाच्या चुका कृपया कोणी काढू नयेत आणि योगायोगाने त्या सापडल्याच तर मूळ लेखकाने जाणूनबुजून, कळून सवरून त्या केलेल्या आहेत असे समजून घ्यावे.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
हे वाक्य मालकांनी स्वतःच दिले आहे. संत तुकारामाच्या अभंगातला धनसंपदा हा शब्द त्यांनी हुषारीने टाळून संतसंगाऐवजी मिसळसंगाची आवड व्यक्त केली आहे. अलीकडच्या काळात त्यांना कार्यबाहुल्यामुळे मिसळपावसाठी पुरेसा वेळ मिळत नाही असे वाचनात आल्यानंतर मुक्ती आणि संपदा आता ज्याला नकोशा वाटायला लागल्या आहेत असा हा मिसळसाथी सदाभाऊ कोण असावा असा एक विकृत प्रश्न कांही लोकांच्या मनात उठतो म्हणे.
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
"Great Power Comes With Great Responsibilities"
A witty saying proves nothing.- Voltaire.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
अशासारखी कांही वेचक (पण गुळगुळीत झालेली) सुभाषिते वाचायला मिळाली, मात्र वर लिहिलेला मूळ लेख आणि त्याला आलेले कांही प्रतिसाद पहाता मिसळीत शिरा मिसळून खात असल्यासारखे वाटले.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
हे संदेश नक्कीच अंतर्मुख करणारे आहेत.
मिसळपावसंस्कृतीला साजेसे कांही संदेश आहेत. उदाहरणार्थ,
Drink Beer,
Save Water !!
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.
माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
यासारखे कांही खोचक संदेश दिसले. त्यातल्या तिस-या संदेशाचे
काय सांगावे .....,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच ते ...,बाकी सगळे शून्य !!
असे रूपांतरही केलेले पाहिले.
एका संदेशकाने संदेश न देण्याचे कारण असे लिहिले आहे,
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
तर दुस-या एकाने
प्रतिसादाचे सर्व अधिकार राखीव आहेत.
असे म्हणून सरळ सरळ मुस्कटदाबी केली आहे.
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
असा एक संदेश आहे. त्यांनी लावलेल्या सुश्राव्य चालींचे कांही दुवे ते देत असतात, पण आमच्याकडे इंटरनेटचे अनलिमिटेड पॅकेज नसल्यामुळे यूट्यूबवरील गाणी पहातांना वेगाने वाढत जाणा-या मेगाबाईट्सकडे लक्ष जाते.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
यातली भाषा आणि आशय दोन्ही नीटसे समजत नाहीत. सगळी संस्थाने कधीची खालसा झालेली असल्यामुळे आता श्री सुध्दा त्याची इच्छा असली तरी कोणालाही शिवाशिवीच्या खेळातलेच राज्य तेवढेच देऊ शकेल असे दिसते.
(महारास्ट्र मैं जाने के लिये हमे कन्टॅक करें|)
ही बिहारीकरणाची चाहूल दिसते. भविष्यकाळात इथे खरोखरीच यूपीबिहारवाल्यांचे राज्यवा आवतवा झाले तर मराठीचा हा अवतार राजमान्य होईल. मर्दमराठे ती वेळ येऊ देणार नाही ही गोष्ट वेगळी.
पण समजा ती आली आणि उत्तरेकडून येणा-या रट्ट्यामुळे मराठ्यांना दक्षिणेकडे सरकावे लागले तर त्यांची भाषा कशी होईल याचे उदाहरण खाली पहाता येईल.
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
नागपूरकडच्या एकाने असे लिहिले आहे
पटता तो टेक. नहीं तो रामटेक.
यातला टेकमधला श्लेष थोडा समजला, पण रामटेकबद्दल कांहीच माहिती नसल्यामुळे उत्तरार्ध पार डोक्यावरून गेला, तसेच मी कुठल्याच बालाजीचा भक्त किंवा फॅन नसल्यामुळे या संदेशाचा अर्थ लागला नाही
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
एकाने असे लिहून जॉनी रावतची आठवण करून दिली.
न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.
या गांवढळ भाषेच्या बरोबर उलट गीर्वाणभाषेत एक संदेश की सूक्त असे कांहीतरी आहे
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
आपल्या संस्कृतप्रेमी विदूषी सध्या मिपावर दिसत नसल्यामुळे त्याचा अर्थ कुणाला विचारावा ते समजत नाही.
कांही सदस्य आपले बोधवाक्य बदलत असतात. माझ्या संशोधनात असे एक उदाहरण माझ्या चटकन लक्षात आले.
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
असे मनसे व्यक्त केल्यानंतर त्यांनी देवाकडे असे मागणे मागितले,
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
मूळ इंग्रजी भाषेतील करेज आणि सिरीनिटी या दोन्ही शब्दांऐवजी शक्ती हा एकच सर्वसमावेशक शब्द वापरल्याने त्या वाक्याचा अर्थ पूर्णांशाने व्यक्त होत नाही असे वाटते. देवाकडे हे मागणे मागण्याची वेळ त्यांनी उर्दूमध्ये अशी सांगितली.
कटी रात सारी मेरी मयकदेमें
खुदा याद आया सवेरे सवेरे!
मला त्यांच्या भाग्याचा हेवा वाटतो. एकाद्या रंगलेल्या पार्टीत हातात जाम आणि लडखडाते कदम अशा अवस्थेत असतांना आमच्यासमोर नेमका कपाळाला गंधाचा उभा टिळा लावलेला एकादा साहेब हातात लिंबूपाण्याचा ग्लास घेऊन दत्त म्हणून उभा रहायचा आणि "व्वॉट्ट हॅप्पन्ड्ड इन् येस्ट्टरड्डेज मीट्टिंग्ग?" असले कांही विचारायचा तेंव्हा त्या क्षणी मला सारे त्यत्तीस कोटी देव आठवायचे.
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|
हे त्यांचे बोधवाक्य ठळक अक्षरात लिहून समोर टांगून ठेवण्यासारखे आहे.
इतर कांही सदस्यांनीसुध्दा उर्दू शायरीचा आधार घेतलेला आहे, उदाहरणार्थ
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने?
शाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है
हे शेर तसे सरळसोपे दिसतात, पण यांचा जास्त सखोल अर्थ समजून घेण्याची इच्छा कोणाला असल्यास तर त्यासाठी सध्या आंतर्जालावर एक वेगळा धागा उपलब्ध आहे, त्याचा लाभ इच्छुकांनी घ्यावा.
कांही प्रतिसादक आपल्या ब्लॉगचा दुवा आपल्या सहीच्या खाली देतात. त्यामागे एक थोडासा इतिहास आहे. जुन्या सदस्यांना तो माहीत असेलच. मिसळपावची स्थापना व्हायच्या आधीपासून कांही मराठी ब्लॉग सुरू आहेत, कांही नंतर उघडले गेले. आपल्या ब्लॉगवर लिहिलेले किंवा दुस-या एकाद्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेले कांही निवडक लिखाण मिसळपाववर द्यायला सुरुवात झाली होती. पण "इतर जागेचे उष्टे खरकटे इथे कशाला आणता?" असा हल्ला झाल्यामुळे त्यातील कांहीजणांनी कानाला खडा लावला. त्यातले कांही लोक वाचकांच्या माहितीसाठी आपला पत्ता आपल्या सहीच्यासोबत देऊ लागले. इतरांनी त्याचे अनुकरण केले. ही माहिती देण्यातसुध्दा प्रत्येकाने आपापले वेगळेपण कसे दाखवले आहे ते पहा.
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
यातल्या शेवटच्या वाक्याचे असे विडंबनसुध्दा झाले आहे,
माझ्या या जागी चार ओळी रखडल्या आहेत, जमल्यास काढुन पहाव्यात.
अशी ही संदेशगाथा थोडक्यात दिली आहे.
या अड्ड्यांवर येणारी थोडी मंडळी स्वतःच्या ख-या नांवाने वावरत असावीत. म्हणजे मी कांही त्यांची फोटो आयडेंटिटीज वगैरे पाहिलेली नाहीत, पण तशा प्रकारची नांवे कधीतरी वाचनात किंवा ऐकण्यात येतात. त्यातल्या दोन तीन लोकांना प्रत्यक्ष भेटण्याचा योगही आला आणि ती त्याच नांवांची खरीखुरी माणसे असल्य़ाची खात्री पटली. पण इतरांबद्दल तसे सांगता येणार नाही. कधीही न ऐकलेली अफलातून नांवे मुलांना ठेवायची रुढी आजकाल पडत असली तरी मिपाच्या कट्ट्यावर दिसणारी कांही नांवे आपल्या मुलांना ठेवायला कोणतेही सूज्ञ आईवडील धजावतील असे वाटत नाही. त्यामुळे त्या सदस्यांनी स्वतःच ते बुरखे पांघरलेले असावेत असे दिसते. कांही सदस्य एक बुरखा पांघरून लिहीत असले तरी अधून मधून त्यातून बाहेर येऊन आपल्या एकाद्या टोपणनांवाने प्रतिसाद देतांना दिसतात. त्यामुळे त्यांचे नांव पुन्हा गुलदस्त्यातच राहते.
तसे पहायला गेल्यास "नांवात काय आहे" असे चारशे वर्षांपूर्वी कोणी साहेब सांगून गेला आणि आजही बरेच लोक तेच वाक्य उच्चारत असतात या अर्थी त्यात कांही तथ्य असावे. त्यामुळे कुठल्या नावाने कोणी सही केली आहे इकडे फार लक्ष न देता त्यांनी स्वाक्षरीबरोबर दिलेले संदेश तेवढेच गोळा करायचा एक अल्पसा प्रयत्न मी केला आहे. यातले कांही लोक एका ओळीच्या चर्चाप्रस्तावावर पानभर लिहून खाली आपली संदेशपूर्ण सही करतात, तर कांहीजण पानभर लांबीच्या लेखाला "वाः", "मस्त", "जियो", "+१", "?", "!", "." असे गर्भित अर्थपूर्ण प्रतिसाद देऊन खाली दोन ओळींचा संदेश देतात. मी त्यांच्यात भेदाभेद केला नाही. संदेश गोळा करतांना वर लिहिलेला मजकूर सविस्तर वाचायला वेळ तरी कसा मिळणार म्हणा. माझ्या या संशोधनाला कोणी प्रायोजक न मिळाल्यामुळे मी आपल्या कुवतीनुसार फक्त एक लहानसा सँपलसर्व्हे केला आहे. ज्या सदस्यांचे महान संदेश यात आले नाहीत त्यांनी कृपया राग मानू नये. तसेच ज्यांचे संदेश मी घेतले आहेत त्यांनी सुध्दा मनात राग न आणता मी केलेल्या अडाणीपणाच्या टिप्पणीवर (वाटल्यास) हंसून घ्यावे अशी त्यांना नम्र विनंती आहे. हे संदेश मी संकेतस्थळावरून जसेच्या तसे उचलले असल्यामुळे त्यातल्या व्याकरणाच्या चुका कृपया कोणी काढू नयेत आणि योगायोगाने त्या सापडल्याच तर मूळ लेखकाने जाणूनबुजून, कळून सवरून त्या केलेल्या आहेत असे समजून घ्यावे.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
हे वाक्य मालकांनी स्वतःच दिले आहे. संत तुकारामाच्या अभंगातला धनसंपदा हा शब्द त्यांनी हुषारीने टाळून संतसंगाऐवजी मिसळसंगाची आवड व्यक्त केली आहे. अलीकडच्या काळात त्यांना कार्यबाहुल्यामुळे मिसळपावसाठी पुरेसा वेळ मिळत नाही असे वाचनात आल्यानंतर मुक्ती आणि संपदा आता ज्याला नकोशा वाटायला लागल्या आहेत असा हा मिसळसाथी सदाभाऊ कोण असावा असा एक विकृत प्रश्न कांही लोकांच्या मनात उठतो म्हणे.
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
"Great Power Comes With Great Responsibilities"
A witty saying proves nothing.- Voltaire.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
अशासारखी कांही वेचक (पण गुळगुळीत झालेली) सुभाषिते वाचायला मिळाली, मात्र वर लिहिलेला मूळ लेख आणि त्याला आलेले कांही प्रतिसाद पहाता मिसळीत शिरा मिसळून खात असल्यासारखे वाटले.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
हे संदेश नक्कीच अंतर्मुख करणारे आहेत.
मिसळपावसंस्कृतीला साजेसे कांही संदेश आहेत. उदाहरणार्थ,
Drink Beer,
Save Water !!
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.
माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
यासारखे कांही खोचक संदेश दिसले. त्यातल्या तिस-या संदेशाचे
काय सांगावे .....,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच ते ...,बाकी सगळे शून्य !!
असे रूपांतरही केलेले पाहिले.
एका संदेशकाने संदेश न देण्याचे कारण असे लिहिले आहे,
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
तर दुस-या एकाने
प्रतिसादाचे सर्व अधिकार राखीव आहेत.
असे म्हणून सरळ सरळ मुस्कटदाबी केली आहे.
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
असा एक संदेश आहे. त्यांनी लावलेल्या सुश्राव्य चालींचे कांही दुवे ते देत असतात, पण आमच्याकडे इंटरनेटचे अनलिमिटेड पॅकेज नसल्यामुळे यूट्यूबवरील गाणी पहातांना वेगाने वाढत जाणा-या मेगाबाईट्सकडे लक्ष जाते.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
यातली भाषा आणि आशय दोन्ही नीटसे समजत नाहीत. सगळी संस्थाने कधीची खालसा झालेली असल्यामुळे आता श्री सुध्दा त्याची इच्छा असली तरी कोणालाही शिवाशिवीच्या खेळातलेच राज्य तेवढेच देऊ शकेल असे दिसते.
(महारास्ट्र मैं जाने के लिये हमे कन्टॅक करें|)
ही बिहारीकरणाची चाहूल दिसते. भविष्यकाळात इथे खरोखरीच यूपीबिहारवाल्यांचे राज्यवा आवतवा झाले तर मराठीचा हा अवतार राजमान्य होईल. मर्दमराठे ती वेळ येऊ देणार नाही ही गोष्ट वेगळी.
पण समजा ती आली आणि उत्तरेकडून येणा-या रट्ट्यामुळे मराठ्यांना दक्षिणेकडे सरकावे लागले तर त्यांची भाषा कशी होईल याचे उदाहरण खाली पहाता येईल.
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
नागपूरकडच्या एकाने असे लिहिले आहे
पटता तो टेक. नहीं तो रामटेक.
यातला टेकमधला श्लेष थोडा समजला, पण रामटेकबद्दल कांहीच माहिती नसल्यामुळे उत्तरार्ध पार डोक्यावरून गेला, तसेच मी कुठल्याच बालाजीचा भक्त किंवा फॅन नसल्यामुळे या संदेशाचा अर्थ लागला नाही
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
एकाने असे लिहून जॉनी रावतची आठवण करून दिली.
न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.
या गांवढळ भाषेच्या बरोबर उलट गीर्वाणभाषेत एक संदेश की सूक्त असे कांहीतरी आहे
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
आपल्या संस्कृतप्रेमी विदूषी सध्या मिपावर दिसत नसल्यामुळे त्याचा अर्थ कुणाला विचारावा ते समजत नाही.
कांही सदस्य आपले बोधवाक्य बदलत असतात. माझ्या संशोधनात असे एक उदाहरण माझ्या चटकन लक्षात आले.
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
असे मनसे व्यक्त केल्यानंतर त्यांनी देवाकडे असे मागणे मागितले,
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
मूळ इंग्रजी भाषेतील करेज आणि सिरीनिटी या दोन्ही शब्दांऐवजी शक्ती हा एकच सर्वसमावेशक शब्द वापरल्याने त्या वाक्याचा अर्थ पूर्णांशाने व्यक्त होत नाही असे वाटते. देवाकडे हे मागणे मागण्याची वेळ त्यांनी उर्दूमध्ये अशी सांगितली.
कटी रात सारी मेरी मयकदेमें
खुदा याद आया सवेरे सवेरे!
मला त्यांच्या भाग्याचा हेवा वाटतो. एकाद्या रंगलेल्या पार्टीत हातात जाम आणि लडखडाते कदम अशा अवस्थेत असतांना आमच्यासमोर नेमका कपाळाला गंधाचा उभा टिळा लावलेला एकादा साहेब हातात लिंबूपाण्याचा ग्लास घेऊन दत्त म्हणून उभा रहायचा आणि "व्वॉट्ट हॅप्पन्ड्ड इन् येस्ट्टरड्डेज मीट्टिंग्ग?" असले कांही विचारायचा तेंव्हा त्या क्षणी मला सारे त्यत्तीस कोटी देव आठवायचे.
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|
हे त्यांचे बोधवाक्य ठळक अक्षरात लिहून समोर टांगून ठेवण्यासारखे आहे.
इतर कांही सदस्यांनीसुध्दा उर्दू शायरीचा आधार घेतलेला आहे, उदाहरणार्थ
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने?
शाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है
हे शेर तसे सरळसोपे दिसतात, पण यांचा जास्त सखोल अर्थ समजून घेण्याची इच्छा कोणाला असल्यास तर त्यासाठी सध्या आंतर्जालावर एक वेगळा धागा उपलब्ध आहे, त्याचा लाभ इच्छुकांनी घ्यावा.
कांही प्रतिसादक आपल्या ब्लॉगचा दुवा आपल्या सहीच्या खाली देतात. त्यामागे एक थोडासा इतिहास आहे. जुन्या सदस्यांना तो माहीत असेलच. मिसळपावची स्थापना व्हायच्या आधीपासून कांही मराठी ब्लॉग सुरू आहेत, कांही नंतर उघडले गेले. आपल्या ब्लॉगवर लिहिलेले किंवा दुस-या एकाद्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेले कांही निवडक लिखाण मिसळपाववर द्यायला सुरुवात झाली होती. पण "इतर जागेचे उष्टे खरकटे इथे कशाला आणता?" असा हल्ला झाल्यामुळे त्यातील कांहीजणांनी कानाला खडा लावला. त्यातले कांही लोक वाचकांच्या माहितीसाठी आपला पत्ता आपल्या सहीच्यासोबत देऊ लागले. इतरांनी त्याचे अनुकरण केले. ही माहिती देण्यातसुध्दा प्रत्येकाने आपापले वेगळेपण कसे दाखवले आहे ते पहा.
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
यातल्या शेवटच्या वाक्याचे असे विडंबनसुध्दा झाले आहे,
माझ्या या जागी चार ओळी रखडल्या आहेत, जमल्यास काढुन पहाव्यात.
अशी ही संदेशगाथा थोडक्यात दिली आहे.
Tuesday, November 03, 2009
आयुधे, औजारे आणि यंत्रे - भाग - ४

यंत्रयुग सुरू झाल्यावर यंत्रांचा विकास प्रचंड वेगाने होत गेला. त्यांच्या सहाय्याने जमीनीतून पेट्रोलियम तेल काढण्याला सुरुवात केल्यानंतर वाफेच्या अवजड इंजिनांच्या जागी तेलावर चालणारी सुटसुटीत इंजिने आली. त्यामुळे अधिक कारखाने सुरू झाले, रस्त्यावर मोटारी धांवायला लागल्या आणि आकाशात विमाने उडू लागली. वीजनिर्मिती आणि पुरवठा करणे शक्य झाल्यानंतर तिच्यावर चालणारी जास्तच सोयिस्कर यंत्रे घराघरात तसेच कारखान्यात आली. अधिकाधिक कणखऱ आणि बळकट अशा मिश्रधातूंचे उत्पादन, त्यांना ठोकून, लाटून, कापून आणि घासून हवा तसा आकार देणे, अशा विशिष्ट आकारांच्या तुकड्यांची जोडणी करून गुंतागुंतीची अवजड यंत्रे तयार करणे शक्य झाले. या सर्वांचा परिणाम अधिकाधिक प्रभावी शस्त्रास्त्रे तयार होण्यावर झालाच. अवजड तोफांच्या जागी वेगवान रणगाडे आले तसेच त्यांना निकामी करणारे बाँब आले. आगबोटींना बुडवण्यासाठी टॉर्पेडोज आले तसेच आगबोटीवरून मारा करण्यासाठी खास प्रकारच्या तोफा आल्या. साध्या बंदुकांऐवजी मशीनगन्स, रॉकेट्स वगैरे गोष्टी आल्या. अनेक प्रकारची अतीवेगवान आणि चपळ विमाने तयार झाली. त्यातून जमीनीवर बाँबहल्ले करणे, पॅराशूटमधून सैनिकांना खाली उतरवणे, अतीशय उंच जाऊन जमीनीवरील ठिकाणांचे निरीक्षण करणे अशी अनेक प्रकारची कामे करता येऊ लागली. ही सगळी शस्त्रास्त्रे म्हणजे खास स्वरूपाची यंत्रेच होती. माणूस हाताने जे काम करू शकतो त्याहून जास्त काम, अधिक वेगाने आणि सफाईने करणे हा प्रत्येक यंत्राचा उद्देश असतो. ही विनाशकारी यंत्रे हाताळणारे सैनिक प्रचंड प्रमाणात विध्वंस करण्याचे काम झपाट्याच्या वेगाने सहजपणे करू शकत होते. यामधील कांही आयुधे शांततेच्या काळात तयार झाली तर कित्येक शस्त्रे पहिल्या दोन महायुध्दांच्या काळात युध्दपातळीवर प्रयत्नांची शर्थ करून तयार केली गेली. ते साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानात भर घालावी लागत गेली हे ओघाने आलेच.
अणुबाँबच्या महाभयंकर विस्फोटाने दुसरे महायुध्द संपले. असे महाविध्वंसक अस्त्र आपल्याकडे असलेच पाहिजे अशा विचाराने अनेक राष्ट्रांनी ते तयार करण्याच्या कार्यक्रमाला प्राधान्य दिले. प्रगत तंत्रज्ञान आणि आर्थिक सुबत्ता ज्यांच्यापाशी होती अशा महासत्तांनी ते तंत्रज्ञान मिळवले, अधिकाधिक शक्तीशाली बाँब बनवून त्याच्या चाचण्या घेतल्या आणि आपले विध्वंसक सामर्थ्य जगाला दाखवून दिले. ही अस्त्रे शत्रूच्या ठिकाणांवर नेमकी नेऊन टाकण्यासाठी अधिकाधिक पल्ला आणि क्षमता असलेली क्षेपणास्त्रे तयार केली गेली. त्यासाठी शक्तीशाली अग्निबाण तयार होत असतांना त्यांच्या सहाय्याने अवकाशात कृत्रिम उपग्रह सोडण्यात आले. सुरुवातीच्या काळात टेहळणी करून माहिती मिळवणे हे त्यांचे मुख्य काम असे. या उपग्रहांबरोबर संपर्क साधण्यासाठी आणि त्यांनी पाठवलेल्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी अत्याधुनिक संदेशप्रणाली आणि संगणक यांचा विकास करण्यात आला. अशा प्रकारे दुस-या महायुध्दानंतरच्या काळात अणुशक्ती, अग्निबाण, उपग्रह आणि संगणक यांच्या तंत्रज्ञानात प्रचंड वेगाने जी प्रगती झाली तिच्या मुळाशी शस्त्रास्त्रस्पर्धा हे एक प्रमुख कारण होते.
असे असले तरी या तंत्रज्ञानाचा माणसाला त्याच्या रोजच्या जीवनात अनेक प्रकारे फायदाही झाला. अणुशक्तीच्या सहाय्याने विजेची निर्मिती होऊ लागली, उपग्रहामुळे सर्वच प्रकारच्या संदेशवहनात क्रांती झाली. दूरचित्रवाणीमुळे जगभरातले कार्यक्रम घरबसल्या पाहता येऊ लागले आणि दूरध्वनीतून पृथ्वीच्या पलीकडल्या बाजूला असलेल्या माणसाबरोबर संभाषण करणे सहज शक्य झाले. घरोघरी संगणक आले आणि आंतर्जालाच्या माध्यमातून लेखी मजकूर, आवाज आणि चित्रे अशा सर्वांची देवाणघेवाण क्षणार्धात करता येऊ लागली. जेथे जाऊ तेथे सांगाती नेता येणा-या मोबाईल फोनमधून असे संदेश जिथे असू तिथे मिळू लागले. वसुधैव कुटुंबकम् अशी मनाची तयारी झाली नाही पण आपण ग्लोबल व्हिलेजचे नागरिक झालो. ही सगळी कमाल या नव्या काळातल्या यंत्रांमुळेच होऊ शकली.
या उपयुक्त सुविधांचा दुरुपयोग करून कांही अतिरेकी विध्वंसक कृत्ये करत आहेत. यामुळे यंत्र आणि शस्त्र, औजार आणि हत्यार यांच्यामधील जवळीक अधोरेखित होते. शस्त्रास्त्रे उदंड झाल्यामुळे मानवजातच समूळ नष्ट होणार असल्याचे भाकीत डूम्सडेवाले कधीपासून करताहेत, त्याचप्रमाणे पूर्वी दिवसभर राबून जेवढे काम होत असे ते आता यंत्रांच्या सहाय्याने चुटकीसरशी होऊ लागले तर उरलेल्या वेळात माणूस काय करेल अशी काळजी काही लोकांना लागली आहे. प्रत्यक्षात मात्र जिकडे पहावे तिकडे माणसेही उदंड होतांना दिसत आहेत आणि तरीसुध्दा बालवाडीतल्या मुलापासून त्याच्या पेन्शनर आजोबापर्यंत कोणाकडेही मोकळा वेळ नसतो. माझ्यासारखा निरुद्योगीसुध्दा हा असला लेख लिहायला काढतो आणि डेडलाईन येईपर्यंत तो टंकत बसतो.
. . . . . . . . . . (समाप्त)
आयुधे, औजारे आणि यंत्रे - भाग - ३

धातूंपासून नळ्या तयार करता येऊ लागल्यावर लहानमोठ्या आकाराच्या तोफा तयार करण्यात यश मिळाले. अवजड तोफा वाहून नेण्यासाठी त्यांना गाड्यावर ठेवले जात असे किंवा चाके जोडली जात आणि जनावरांना जुंपून त्या ओढून नेल्या जात. तोफेच्या नळकांड्यात दारू ठासून भरत आणि त्याच्या पुढे दगडाचा किंवा लोखंडाचा गोळा ठेवला जाई. दारूच्या आतपर्यंत जाणारी एक कापसाची वात असे. ती पेटवली की जळत जळत तिची ज्वाला दारूपर्यंत पोचे आणि तिचा क्षणार्धात स्फोट होऊन त्या ज्वलनातून खूप वायू निर्माण होत. ते वायू मर्यादित जागेत कोंडले गेल्याने त्याचा दाब वाढत जाई आणि त्या दाबाच्या प्रभावाखाली तो गोळा वेगाने बाहेर फेकला जात असे. नळीतून जातांना मिळालेल्या दिशेने दूरवर जाऊन तो खाली पडत असे. आभाळातून अचानक आलेल्या या यमदूताचा प्रतिकार करणे शत्रूला शक्यच नसल्यामुळे त्याची दाणादाण उडत असे. शत्रूसैन्यावर दुरून मारा करण्यात तोफ अतीशय परिणामकारक असली तरी ती धनुष्यबाणाची जागा घेऊ शकत नव्हती. ती अवजड असल्यामुळे वेगाने वाहून नेता येत नसे आणि घनदाट जंगलात किंवा डोंगराळ भागात नेणे तर कठीणच असे. शिवाय एक बार उडाला की दुसरा बार भरायला वेळ लागत असे. त्यामुळे हातघाईच्या लढाईत तिची अडचणच होत असे. लहान आकाराच्या नळ्यांचा उपयोग करून हँडगन्स, बंदुका आणि पिस्तुलांची निर्मिती करण्यात आली. ही शस्त्रे आणि त्यांसाठी लागणारा दारूगोळा सैनिक आपल्या सोबत घेऊन जाऊ शकत. मोठ्या तोफांचा उपयोग खास कामांसाठी केला जाऊ लागला. युध्द चालले नसतांना फुरसतीच्या काळात या तोफा किल्ल्यांच्या तटबंदीच्या आड आणि बुरुजांवर नेऊन ठेवल्या जात. चालून येणा-या शत्रूसैन्यावर दुरून गोळाफेक करून त्यांची वासलात लावली जात असे. तसेच किल्ल्याला वेढा घालून बसल्यावर त्याच्या लाकडी दरवाज्याला किंवा विटांच्या तटबंदीला तोफेच्या सहाय्याने खिंडार पाडून आंत प्रवेश मिळवला जात असे.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग होत राहिले. तोफेसारख्या नळीतून वेगाने गोळा सोडण्याएवजी एक दट्ट्या हळूहळू पुढेमागे ढकलणे, त्याला दांड्याद्वारे चक्राला जोडणे, पाणी उकळून त्याची वाफ करणे, ती मजबूत पात्रात साठवणे, पाइपातून दुसरीकडे नेणे, तिच्या दाबावर आणि प्रवाहावर झडपांद्वारे नियंत्रण ठेवणे अशा निरनिराळ्या क्षेत्रातील प्रयोगातून मिळालेल्या माहितीची एकमेकींशी सांगड घालण्याचे प्रयत्न होत होते. अशा प्रयत्नांमधून वाफेच्या दाबाने सिलिंडरमधून पिस्टनला आतबाहेर ढकलून त्याला जोडलेले चाक फिरवण्यात यश मिळाले. त्या यंत्राची रचना अशी केलेली होती की एकदा हे इंजिन सुरू केले की जोपर्यंत बॉयलरमध्ये वाफ तयार होत राही तोपर्यंत तो पिस्टन सतत आतबाहेर करत राही आणि त्याला एका दांड्याने जोडलेले चक्र सतत फिरत राही. हे सगळे आज सोपे वाटत असले तरी त्यासाठी निरनिराळ्या आकारांच्या भागांची कल्पना करून त्याबरहुकूम त्यांची निर्मिती कार्यशाळेत करता येणे आवश्यक होते. यंत्रांच्या विकासाने एवढी मजल मारल्यानंतरच ते शक्य झाले. वाफेचे इंजिन बनवल्यानंतर त्याच्या रूपाने ऊर्जेचा एक नवा अखंड स्रोत सापडला. त्यापूर्वी अग्नीचा उपयोग फक्त ऊष्णता निर्माण करण्यासाठी होत असे. आता अग्नीच्या शक्तीवर चाके फिरू लागली. वाहत्या वा-यावर फिरणा-या पवनचक्क्या आणि पाण्याच्या प्रवाहाने फिरणारी जलचक्रे त्याआधी निघाली होती, पण अग्नीवर चालणारे इंजिन सोयिस्कर जागी ठेवणे आणि केंव्हाही हवा तितका वेळ चालवणे शक्य असल्यामुळे ते जास्त सोयीचे होते.
यंत्रांची चाके फिरवण्याचे काम हाताने करणा-याच्या शक्तीला मर्यादा असत, तसेच तो माणूस थोड्या वेळात थकून जात असे. घोडे किंवा बैल यांच्या शक्तीचा उपयोग मुख्यतः गाडा ओढण्यापुरताच होत असे. उसाचा चरक, तेलाची घाणी यासारखी कांही थोडी यंत्रेच जनावरांकडून फिरवली जात असत. वाहता वारा, पाण्याचा प्रवाह वगैरेंच्या सहाय्याने चाक फिरवणे कांही थोड्या जागी कांही विशिष्ट परिस्थितीतच शक्य असल्यामुळे अशा यंत्रांचा उपयोग कमीच होत असे. पण वाफेच्या इंजिनाने या सगळ्या मर्यादा पार केल्या. जितके मोठ्या आकाराचे इंजिनाचे भाग तयार करता येतील, जितक्या प्रमाणात वाफ निर्माण करून तिचा दाब वाढवत नेता येईल आणि जितक्या वेगाने झडपांची उघडझाप करता येईल तितकी जास्त शक्ती त्या इंजिनात असेल. या सगळ्या बाबीत सुधारणा करत जाऊन अधिकाधिक जास्त अश्वशक्ती असलेली इंजिने तयार होऊ लागली. पूर्वी जितकी यांत्रिक कामे माणसांच्या बाहुबलाने होत असत ती इंजिनाच्या ताकतीवर अनेकपट जोमाने आणि वेगाने होऊ लागली. त्यामुळे अधिकाधिक सक्षम यंत्रे विकसित होत गेली. रुळावरून धांवणारी रेल्वेगाडी, पाण्यात चालणारी जहाजे, कापड विणण्याचे माग, खाणीतून खनिजांचे उत्खनन करून ते जमीनीवर आणण्याची यंत्रणा, त्यापासून धातू बनवण्याचे काम करणा-या भट्ट्या आणि त्याला आकार देणारी यंत्रे अशी असंख्य उदाहरणे देता येतील. या सर्वांचा उपयोग करण्यात शस्त्रनिर्मितीला अग्रक्रम मिळाला. तोफा, बंदुका वगैरेंचे कारखाने धडधडू लागले तसेच त्यांच्या गुणवत्तेत सतत वाढ होत राहिली. युरोपमधील देशांनी या बाबतीत आघाडी मारल्यामुळे ते देश शस्त्रसज्ज झाले आणि त्याच्या जोरावर त्यांनी जगभर आपली साम्राज्ये स्थापन केली.
. . . ...... . . . . . . . (क्रमशः)
Monday, November 02, 2009
आयुधे, औजारे आणि यंत्रे - भाग -२

शस्त्र चालवण्यातली निपुणता, बाहूबल, मनाचा खंबीरपणा, जिद्द, समयसूचकता वगैरे अनेक वैयक्तिक गुणांचा युध्दात विजय संपादन करण्यात मोठा वाटा असतो हे जरी खरे असले तरी सैनिकाच्या हातात चांगले शस्त्र आले तर या सगळ्या गुणांचा परिणाम कांही पटींनी वाढतो. ज्या सैन्याकडे उच्च दर्जाची शस्त्रे होती, त्यांचीच युध्दात सरशी होत गेली असे इतिहासात बहुतेक वेळा घडले आहे. त्यामुळे सर्व शासनकर्त्यांना आपले सैन्य अत्याधुनिक शस्त्रास्त्राने सुसज्य ठेवणे आवश्यक असे. ज्यांनी इकडे दुर्लक्ष करून विलासोपभोगाकडे अधिक लक्ष दिले त्यांची अधोगती होत गेली, कांहींची तर दुर्गती झाली.
माणसाने अग्नीवर नियंत्रण मिळवल्यानंतर त्याचा उपयोग प्रत्यक्ष संहार करण्यासाठी सुध्दा केला जाऊ लागला. सर्वसामान्य माणसाकडे लाकूड, कापूस, खाद्य तेल यासारखे जे ज्वलनशील पदार्थ असत त्यांचा संहारक उपयोग विरोधकांच्या घराला किंवा साठ्याला आग लावण्यापुरताच मर्यादित असे. अशा वस्तू युध्दभूमीवर वाहून नेण्यात विशेष फायदा नव्हता. पण कांही अत्यंत ज्वालाग्राही पदार्थांचा शोध लागल्यानंतर त्यांचा उपयोग लढाईसाठी होऊ लागला. शत्रूच्या खेम्याला आग लावणे, त्याच्या सैन्यातील जनावरांना बिथरवणे, त्याची शस्त्रास्त्रे उध्वस्त करणे, त्याच्या तटबंदीला सुरुंग लावून त्यात खिंडार पाडणे अशासारखी कामे करता येऊ लागली. एकाद्या नळीमध्ये हा स्फोट घडवून आणला तर त्यातून एकादे अस्त्र दूर भिरकावता येईल अशी कल्पना कुणाला सुचली असली तरी अशी भक्कम नळकांडी कुठून आणायची हा प्रश्न होता. निसर्गात उपलब्ध असलेली वेळूची नळी वापरली तर मोठ्या स्फोटामुळे तिच्या जागच्या जागीच ठिक-या होऊन गेल्या असत्या. मात्र अशा छोट्याशा नळीत थोडीशी दारू भरून ती बाणाच्या टोकाशी ठेऊन शत्रूवर सोडायचे प्रयोग चीनमध्ये झाले. लक्ष्यावर जाऊन आपटल्यावर ती पेट घेत असे किंवा धनुष्यातून सोडल्यावर जळत जळत पुढे जात असे. त्याला एक प्रकारचे अग्नीअस्त्र म्हणता येईल.
माणसाला प्राचीन कालखंडातच चाकाचे महत्व समजले. लाकडापासून बनवलेल्या चाकांच्या आधारावर उभे असलेले गाडे त्याने बनवले आणि बैल, रेडे, घोडे, उंट यासारख्या पशूंच्या बलाचा वापर करून त्यावरून वाहतूक सुरू केली. अशाच तत्वावर बांधलेल्या रथात बसून राजे महाराजे युध्दभूमीवर आपल्या सैन्याचे नेतृत्व करू लागले. पराक्रमी वीरांना अतीरथी, महारथी यासारखी बिरुदे देत असत. औजारे बनवण्याच्या कामात चाकाचा चांगलाच उपयोग झाला. कुंभाराचे लाकडाचे चाक, विहिरीतून पाणी उपसण्याचा रहाट ही कांही उदाहरणे झाली. पण ती चाके तयार करण्यासाठी सुताराने चाकावर फिरणा-या यंत्रांचाच उपयोग केला असणार. लेथ या प्रकारच्या यंत्रात लाकडाच्या ठोकळ्याला गोलाकार देता येतो आणि ड्रिल या प्रकारच्या यंत्राने त्यात गोल आकाराचे भोक पडते. त्या भोकात वर्तुळाकार दांडा बसवता येतो. या दोन प्रकारच्या यंत्रांचा उपयोग करून वेगवेगळ्या आकाराची आधी लाकडाची आणि नंतर लोखंडासह धातूंची चाके आणि गोल आकाराचे दांडे यासारखे दंडगोल तयार होऊ लागले.
पूर्वीच्या काळात ही यंत्रे माणसांनी हातानेच फिरवावी लागत हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे किती मोठ्या आकारमानाची व वजनाची वस्तू त्यातून निर्माण करता येईल यावर मर्यादा येत असे. एक मोठे चाक आणि एक लहान चाक पट्ट्याने एकमेकांना जोडून या मर्यादा वाढवण्याचे तंत्र तयार झाले. दाते असलेली चाके (गियरव्हील्स) तयार करून ती थेट एकमेकांना जोडली जाऊ लागल्यावर त्यांची मालिका करता येणे शक्य झाले. त्यांचा उपयोग करून एकादे लहान चक्र खूप वेगात फिरवणे तसेच अवाढव्य आकाराचे चक्रदेखील हाताच्या जोराने (हळूहळू) फिरवणे या दोन्ही गोष्टी साध्य करता आल्या. चाकाला विशिष्ट प्रकारचा दांडा जोडून चाक फिरवताच तो दांडा पुढे मागे किंवा वरखाली सरकवता येऊ लागला किंवा दांड्याला सरळ रेषेत गती देऊन त्याला जोडलेले चक्र गोल फिरवणे शक्य झाले. अशा अनेक प्रकारच्या सुधारणा होत होत औजारांच्या जोडीला यंत्रे आली. यंत्रांच्या सहाय्याने लोखंडाला अनेक प्रकारचे आकार देता येणे शक्य झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रांची रचना करणे शक्य झाले. शेती, विणकाम, सुतारकाम, लोहारकाम वगैरे अनंत व्यवसायात लागणारी औजारे तयार करण्याचे काम सोपे झाले. या यंत्रांचा उपयोग आयुधे तयार करण्यासाठी प्रामुख्याने होऊ लागला. त्यातून चाकू, सु-या, कात्र्या वगैरे बनू लागल्याच, पण कट्यारी आणि तलवारींना आकार देणे, त्यांना धार लावणे वगैरे कामे मोठ्या प्रमाणावर करता येऊ लागली. शस्त्रांचे कारखाने उभे राहिले.
. . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)
आयुधे, औजारे आणि यंत्रे - भाग - १

आदिमानवाने जेंव्हा पहिल्यांदा हातात एक दांडके धरून त्याने जोराचा दणका दिला असेल, तेंव्हा त्यातून दोन गोष्टी साध्य झाल्या. फक्त आपल्या हाताने तो जेवढ्या जोराने प्रहार करू शकला असता त्यापेक्षा जास्त परिणामकारक तडाखा त्याने दिला आणि दुसरी म्हणजे त्याचा हात जेथपर्यंत पोचू शकला असता त्याच्या पलीकडे त्याचा मारा पोचला. अशा दोन प्रकारांनी त्याची क्षमता वाढली. हिंस्र पशूपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी किंवा दुबळ्या प्राण्याला मारून त्याचे भक्षण करण्यासाठी त्याने हा वार केला असला तर ते त्याचे आयुध झाले आणि झाडाचे फळ तोडण्यासाठी किंवा काटेरी झुडुप बाजूला करण्यासाठी असेल तर ते त्याचे औजार झाले. क्षमतेपेक्षा जास्त परिणाम साधणे हाच या दोन्हीमागील मुख्य उद्देश असतो. ज्या कामासाठी संपूर्ण क्षमतेचा उपयोग करण्याची गरज नसते ती करतांना आयुधे आणि औजारांच्या वापराने आपले काम सोपे होते. या दोन्हीमधला अन्यौन्य संबंध अनादिकालापासून चालत आला आहे.
इतर प्राण्यांच्या मानाने मनुष्यप्राणी अधिक बुध्दीमान असल्यामुळे निरीक्षण, परीक्षण, आकलन वगैरेंद्वारे तो नव्या गोष्टी शिकत गेला आणि नवे प्रयोग करून आपली क्षमता वाढवत गेला. हातातले दांडके कठीण आणि बळकट असेल आणि त्याचे टोक अणकुचीदार किंवा धारदार असेल तर ते जास्त परिणामकारक ठरेल, ते फेकून मारले तर त्याचा मारा कांही अंतरावर असलेल्या लक्ष्यापर्यंत जाऊ शकेल वगैरे गोष्टींचा विचार करून तो वेगवेगळ्या प्रकारच्या आयुधांच्या सुधारित आवृत्या काढत गेला. इतर प्राणी मात्र निसर्गदत्त नखे, शिंगे, सुळे वगैरेंचाच उपयोग करीत राहिले. त्यामुळे त्यांना नामोहरम करणे माणसाला अधिकाधिक सोपे होत गेले, हिंस्र पशूंची भीती कमी झाली. गाय, बैल, घोडा आदि कांही पशूंना तर त्याने वेसण घातले आणि कधी त्यांच्या पाठीवर चाबकाचे फटकारे मारून तर कधी मायेचा हात फिरवून व प्रेमाने खायला चारा देऊन त्यांना आपल्या सेवेला जुंपले. सुरुवातीच्या काळात निसर्गात आपोआप वाढलेल्या अरण्यात अन्न शोधत फिरत असतांनाच माणसाने निरनिराळ्या वनस्पतींचा बारकाईने अभ्यास केला आणि त्यातल्या आपल्या उपयोगाच्या वनस्पतींची मुद्दाम लागवड करून त्यापासून धान्य, भाजीपाला, फळफळावळ वगैरेंची पैदास करायला सुरुवात केली. अशा प्रकारे त्याचे जीवन इतर पशूंपेक्षा खूप वेगळे झाले. ते करण्यासाठी आयुधांची तसेच औजारांची निर्मिती करून तो त्यांचा उपयोग करत गेला.
आदिमानवाने हातात मिळालेल्या दांडक्याचा तडाखा दुस-या माणसालाही मारला असणारच. पण तोसुध्दा बुध्दीमान असल्यामुळे त्याने जास्त चांगले दांडके हातात घेऊन प्रतिकार केला असणार. अशा प्रकारे माणसामाणसांमधील शस्त्रस्पर्धा आदिमानवाच्या काळापासून सुरू झाली आणि अजून ती चाललेलीच आहे. माणसाची जसजशी प्रगती होत गेली तसतसा त्याच्या हातातील आयुधांच्या रूपात फरक पडत गेला. अग्नी कसा पेटवायचा, कसा प्रज्वलित ठेवायचा आणि कसा विझवायचा हे आत्मसात केल्यानंतर आणि त्यात कशाकशाची आहुती घालता येते याचे ज्ञान झाल्यानंतर त्याचा उपयोग करून पूर्वी अशक्य असलेली अनेक कामे तो करू लागला. खनिज पदार्थांपासून विविध धातू, मुख्यतः लोखंड आणि त्यापासून पोलाद तयार करण्याच्या कलेने त्याच्या जीवनात प्रचंड फरक पडला. त्यापासून तलवार, कट्यार, खंजीर यासारखी आयुधे तयार करता आली आणि त्याचे कणखर टोक अग्रभागी बसवल्यामुळे बाण आणि भाला यांची मारक शक्ती अपरंपार वाढली. त्याचप्रमाणे लाकूड तोडण्यासाठी कु-हाड, जमीन खणण्यासाठी कुदळ व पहार, दगडमातीचा ढिगारा उपसण्यासाठी फावडे, ती वाहून नेण्यासाठी पाटी, स्वयंपाक करण्यासाठी तवा, परात, कढई वगैरे असंख्य आयुधे, औजारे व उपकरणे त्यापासून तयार करता येऊ लागली. प्राचीन इतिहासकाळाच्याही आधी या प्रकारच्या अनेक गोष्टी माणसाच्या वापरात आल्या होत्या. इतिहासातात नोंदल्या गेलेल्या सर्व लढाया अशा आयुधांचा उपयोग करूनच लढल्या गेल्या होत्या. ही आयुधे तयार करण्यासाठी विविध प्रकारची औजारे त्या काळात उपलब्ध असणारच. या दोन्हींचा विकास एकमेकांच्या बरोबरीने होत राहिला.
लोखंड तयार करण्याचे काम घरोघरी करता येत नाही. लोखंडाचे खनिज सगळीकडे सापडत नाही. ते अत्यंत उच्च तपमानापर्यंत तापवण्याचे काम घरातल्या चुलीत होऊ शकत नाही. ते खास प्रकारच्या भट्टीतच करावे लागते. त्यानंतर वितळलेल्या लोखंडाचा अती ऊष्ण रस साच्यात ओतायचे काम साध्या हाताने किंवा लाकडाच्या औजाराने करणे शक्य नसते. त्यासाठी खास प्रकारची साधनसामुग्री लागते. ती आधी तयार व्हायला हवी. प्राचीन काळात कुठल्याच प्रकारची स्वचालित यंत्रसामुग्री अस्तित्वात नसल्यामुळे सारी कामे माणसाच्या हातातले बळ आणि त्याची सहनशक्ती यांच्या मर्यादेत राहूनच करावी लागत. त्यामुळे कांही थोड्या ठिकाणीच अल्प प्रमाणात लोखंड तयार केले जात असे आणि व्यापाराद्वारे ते इतरत्र पोचत असे. लोखंडाच्या गोळ्याला तो मऊ होण्याइतपत तापवून ऐरणीवर ठेवणे आणि घणाच्या घावाने त्याला हवा तसा आकार देणे ही कामे तुलनेने सोपी आणि अनेक ठिकाणी करता येण्याजोगी असल्यामुळे लोहारकाम मात्र गांवोगांवी होऊ लागले आणि त्यातून शस्त्रे आणि औजारे तयार होऊ लागली. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात कोठल्याही धातूचा उपयोग आजच्या मानाने कमीच असे. घरोघरी मातीच्या चुली तर असतच, पण मातीचीच गाडगी, मडकी असत. श्रीमंत लोकांकडे रांजण असतील. धान्यधुन्य ठेवण्यासाठी दगडामातीपासून बांधलेली कोठारे, हौद किंवा पेवे असत.
.. . . . . . . . . .(क्रमशः)
Subscribe to:
Posts (Atom)