Sunday, August 29, 2010

पंपपुराण द्वितीय खंड - ९



पिस्टन पंपामध्ये थोडासा फरक करून डायफ्रॅम पंप तयार केला जातो. पिस्टनला सुलभपणे सिलिंडरच्या आत बाहेर करता यावे, या क्रियेमध्ये घर्षण कमीत कमी व्हावे या दृष्टीने पिस्टन आणि सिलिंडर यांमध्ये अल्पशी फट ठेवावीच लागते. त्या फटीतून होणारी द्रवाची गळती पिस्टन रिंग्ज आणि सील्सचा उपयोग करून थांबवण्याचा प्रयत्न केला जात असतो. हे सगळे करून सुध्दा ती अगदी शून्यावर आणता येत नाही. सील्स, गास्केट वगैरे गोष्टी काळानुसार गळू लागतात आणि त्यामुळे त्यात वाढ होत जाते. अत्यंत महत्वाच्या किंवा धोकादायक द्रवपदार्थांना पूर्णपणे बंदिस्त ठेवण्यासाठी डायफ्रॅम पंपाचा उपयोग करता येतो.

या पंपात पिस्टन आणि द्रवपदार्थ यांच्यामध्ये एक लवचीक पण मजबूत पडदा बसवलेला असतो. पिस्टन आणि सिलिंडरच्या भागात सर्वसामान्य तेल (हैड्रॉलिक ऑइल) भरलेले असते. पिस्टनला पुढे ढकलले की त्या चेंबरमधला दाब वाढतो आणि पडदा पुढे ढकलला जातो. पिस्टनला मागे ओढले की चेंबरमध्ये पोकळी निर्माण झाल्यामुळे पडदा मागे ओढला जातो. अशा प्रकारे मोटरच्या सहाय्याने पिस्टनला मागे पुढे करतांना त्याच्या बरोबर चेंबरमधला पडदासुध्दा मागे पुढे होतो. ज्या द्रवाचा प्रवाह हवा असेल तो चेंबरच्या पडद्यापलीकडल्या भागात भरलेला असतो. पिस्टन पंपाप्रमाणेच या भागातल्या द्रवाचा दाब कमी जास्त होत राहतो आणि तो कमी होताच इनलेट पोर्टमधून द्रव एका बाजूने चेंबरमध्ये येतो आणि दाब वाढताच तो औटलेट पोर्टमधून दुस-या बाजूने बाहेर पडतो. हा चेंबर सर्व बाजूंनी पॅकबंद असल्यामुळे द्रवाच्या वातावरणात गळण्याची शक्यता नसते.

इतर पंपांच्या तुलनेत पाहता डायफ्रॅम पंपांमध्ये आणखी एक वेगळा गुण आहे. त्यात गोल फिरणारे चाक किंवा मागेपुढे होणारा पिस्टन असा कोणताही चलता पुर्जा नसल्यामुळे त्या पुर्ज्यात कचरा अडकल्यामुळे तो जाम होऊन बंद पडण्याची शक्यता नसते. इनलेट आणि औटलेट व्हॉल्ह वगळता सगळीकडे मोकळी जागा असल्यामुळे प्रवाहाला अडथळा निर्माण होत नाही. या कारणामुळे दाट किंवा व्हिस्कस अशा द्रवांसाठी डायफ्रॅम पंपाचा उपयोग करता येतो.

काही ठिकाणी विजेचा प्रवाह उपलब्ध नसतो किंवा थोड्या काळासाठी तात्पुरता उपयोग करायचा असेल तर तेवढ्यासाठी वायरिंग वगैरे करणे खर्चिक असते. अशा जागी एअर काँप्रेसरवर चालणारी न्यूमॅटिक उपकरणे वापरली जातात. बांधकाम, रस्तादुरुस्ती अशा जागी आपल्याला ती दिसतात. अशा ठिकाणी पाणी उपसण्यासारखे काम करण्यासाठी हवेच्या दाबावर चालणारा डायफ्रॅम पंप वापरता येतो. या पंपामधल्या पिस्टनला मागे पुढे करण्यासाठी वेगळी व्यवस्था असते. न्यूमॅटिक हातोडा चालवण्यासाठी अशाच प्रकारची व्यवस्था असते. यात एअर काँप्रेसरद्वारे एका लहानशा टाकीत हवा भरून तिचा दाब वाढवला जातो. वाफेच्या इंजिनाप्रमाणे ही हवा सिलिंडरच्या दोन्ही भागात आळीपाळीने सोडल्यामुळे त्यातला दट्ट्या मागेपुढे होत राहतो. या पिस्टनला हातोडा जोडला तर तो दगड फोडण्याचे काम करतो. याच तत्वाचा उपयोग करून डायफ्रॅम पंप चालवला जातो.

Friday, August 27, 2010

नुकसान आणि नुकसानभरपाई

रोजचे वर्तमानपत्र उघडून पाहिले तर त्यात निदान सात आठ तरी अपघातांच्या बातम्या दिसतात. बस, ट्रक, मोटार किंवा दुचाकी वाहन यांच्यातल्या टकरा किंवा त्यांनी पादचा-यांना, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या, बसलेल्या किंवा झोपलेल्या माणसांना दिलेली धडक अशा प्रकारच्या दुर्घटना रोज घडत असतात. रेल्वेगाड्या, जहाजे किंवा विमान यांचे अपघातही अधून मधून होत असतात, तसेच इमारत कोसळणे, आग लागणे, यंत्रात बिघाड होणे, रसायनांचा स्फोट होणे वगैरे अपघातसुध्दा घडत असतात. ज्यात एकाही अपघाताबद्दल छापून आलेले नाही असे वर्तमानपत्र मी तरी अद्याप पाहिलेले नाही. रोजच्या या बातम्या वाचून आपले मन निर्ढावले गेले असते आणि आपण ते पान शांतपणे उलगडतो आणि ती बातमी विसरून जातो. त्या घटनेचा पाठपुरावा करणे तर दूर राहिले.

कधी कधी या अपघाताची झळ ज्यांना बसते ते आपल्या जवळचे अथवा ओळखीचे किंवा माहितीतले असतात. अशा वेळी आपण अस्वस्थ होतो, दुःखी होतो, भयंकर संतापतो. याला कोण जबाबदार आहे ते शोधून काढायचा प्रयत्न करतो, त्याला कसे शासन करता येईल याचा विचार करतो, तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी काय करता येईल, काय करायला हवे, काय केले, त्यातून काय निष्पन्न झाले वगैरे बाबींकडे लक्ष देतो.

कोणत्याही यांत्रिक अपघाताला अनेक बाजू असतात. यंत्राचा मालक किंवा चालक, दुर्घटनाग्रस्त व्यक्ती, यंत्राचा निर्माता, विक्रेता वगैरे लोक वेगवेगळ्या दृष्टीकोनांमधून त्याच्याकडे पाहतात. जेंव्हा एकादे यंत्र किंवा वाहन चालवणारा माणूसच त्या अपघाताला पूर्णपणे जबाबदार असतो आणि फक्त त्याचेच नुकसान होते, त्या वेळी त्याची भरपाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पण बहुतेक वेळी या व्यक्ती भिन्न असतात. काही वेळा दुर्घटनाग्रस्त व्यक्ती केवळ योगायोगाने अपघातस्थळी हजर असल्यामुळे त्यात सापडते. तिचा त्या इमारतीशी, वाहनाशी किंवा यंत्राशी कसलाही संबंधच नसतो. अशा वेळी तिची काहीच चूक नसतांना तिचे नुकसान झाले असेल तर त्याची भरपाई मिळायलाच हवी असे कोणालाही निश्चितपणे वाटेल.

ही भरपाई कोणी करावी आणि ती किती असावी यासंबंधी काही संकेत आहेत. जो कोणी या अपघाताला जबाबदार असेल त्याने त्यात झालेली हानी भरून काढावी हे न्याय्य वाटते. पण ते करण्याची त्याची कुवत असली पाहिजे. बसच्या अपघातात एकादा माणूस दगावला तर त्याच्या आयुष्याची भरपाई बसचा ड्रायव्हर करू शकतच नाही. त्याच्या तुटपुंज्या पगारातून खरे तर तो काहीच देऊ शकत नाही. बसचा मालक कदाचित धनवान असेल आणि थोडे बहुत सहाय्य करू शकेल, पण या अपघातात त्याची व्यक्तिशः काही चूक नसतांना तो किती भरपाई देऊ करेल याबद्दल शंका आहे. निष्काळजीपणाबद्दल त्या ड्रायव्हरला शिक्षा होईल, त्याची नोकरी जाईल, त्याचे लायसेन्स जप्त होईल वगैरे वचक बसवणारे नियम आहेत. त्यामुळे ड्रायव्हर सावध राहतात. पण सगळे असूनसुध्दा अॅक्सिडेंट्स होतातच आणि तो नेमका कशामुळे झाला आणि त्याला नेमका कोण जबाबदार आहे हे नक्की ठरवणे काही वेळा अशक्य असते. त्यात वाहनाच्या चालकाची चूक असू शकते तशी ती इतर कोणाचीही असू शकते किंवा यांत्रिक बिघाड त्याला कारणीभूत असू शकतो. हा यांत्रिक बिघाड त्या यंत्रातील मूलभूत दोषामुळे किंवा वेळेवर त्याची देखभाल व दुरुस्ती न केल्यामुळे घडू शकतो. कधीकधी तोही अगम्य कारणांमुळे होतो. चक्काचूर झालेल्या यंत्रातला कोणता भाग आधी तुटला आणि त्यामुळे कोणता भाग नंतर मोडला हे खात्रीपूर्वक सांगता येत नाही.

अशा अनेक घटना रोज घडत असल्यामुळे सर्व वाहनांचा विमा उतरवला जाणे हे कायद्याने आवश्यक केले आहे आणि विमा कंपनीकडून नुकसान भरपाई करण्याची व्यवस्था आहे. त्यांच्या नियमानुसार ठराविक प्रमाणात नुकसानभरपाई मिळते. ती मान्य नसेल तर अनेक वेळा हे प्रकरण न्यायालयात नेले जाते आणि नुकसानभरपाईची रक्कम न्यायाधीश ठरवतात. मोठ्या रेल्वे अपघातांनंतर केंद्र सरकारकडून काही नुकसानभरपाई जाहीर केल्याचे आपण वर्तमानपत्रात वाचतो. विमानाच्या अपघातानंतर याहून अधिक मोठ्या रकमा जाहीर केल्या जातात.

अपघातात झालेल्या नुकसानीचे अनेक पैलू असतात. जे वाहन किंवा यंत्र नादुरुस्त किंवा नष्ट होते त्याची किंमत किंवा त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारा खर्च हे मालकाचे किमान नुकसान झाले. त्याचा काही हिस्सा त्याला भरपाईदाखल मिळतो. यंत्राची गॅरंटी किंवा वॉरंटी शिल्लक असली, वार्षिक मेंटेनन्स काँट्रॅक्ट असले तर दुरुस्तीचा खर्च येणार नाही, ते यंत्र बदलूनही मिळू शकते. तरी पण यात वाया जाणारा वेळ आणि मधील काळात उत्पादन न झाल्यामुळे झालेली तूट मालकालाच सोसावी लागते, त्यात त्याची चूक असो वा नसो.

जे लोक अपघातात हताहत होतात त्यांचे नुकसान पैशाने भरून येण्यासारखे नसतेच. जखमी झालेला मनुष्य पूर्ववत बरा होऊ शकतो, पण पंगु किंवा मृत व्यक्तींचे नुकसान कायमचे होते. तरीसुध्दा त्याला किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या कुटुंबातील माणसांना पुढील आयुष्य सुसह्य करता यावे म्हणून नुसानभरपाई मिळण्याबद्दल संकेत आहेत. त्या अपघाताला कारणीभूत असलेली व्यक्ती किंवा तिची संस्था, अपघातग्रस्त व्यक्ती जिथे कामाला आहे ती संस्था, विमा कंपनी, सरकार वगैरे काही स्रोतांमधून ही मदत केली जाते.

या सर्वांमधून एक गोष्ट दिसून येईल की यांत्रिक अपघात त्या यंत्रामुळे घडला असला किंवा त्यामुळे होणारी हानी त्या यंत्रामुळे वाढली असली तरी त्या यंत्राचा निर्माता किंवा विक्रेता याला सहसा त्याची नुकसानभरपाई द्यावी लागत नाही. कोणत्या प्रकारच्या किंवा मॉडेलच्या वाहनांमध्ये किंवा यंत्रांमध्ये किती अपघात झाले, त्यात कशा प्रकारचे किती नुकसान झाले वगैरेची माहिती गोळा करण्याचा थोडा फार प्रयत्न होत असतो आणि भविष्यात ते टाळण्यासाठी सुधारणासुध्दा होत असतात, पण होऊन गेलेल्या दुर्घटनांची जबाबदारी स्वीकारून त्याची नुकसानभरपाई कोणा मोटार कारखानदाराने दिली आहे असे कधी ऐकले नाही. काही मॉडेल्समधला एकादा भाग सदोष असल्याचे आढळल्यामुळे ती मोटार किंवा सेलफोन ज्या कोणाकडे असेल त्याने तो भाग मोफत बदलून घ्यावा अशा प्रकारच्या जाहिराती क्वचित कधी वाचनात येतात. अमेरिकेत त्याचे प्रमाण अधिक आहे. पण यातसुध्दा ते काम करवून घेण्याची जबाबदारी ते यंत्र ज्यांच्याकडे असते त्या व्यक्तीवरच असते. त्याने ते काम करण्याच्या आधीच अपघात झाला तर ती त्याचीच जबाबदारी ठरते.

या विषयावर लिहिण्याचे कारण म्हणजे सध्या न्यूक्लीयर लायेबिलिटी बिलवर चर्चा चालली आहे. अणुविद्युतशक्तीकेंद्रात जर चेर्नोबिलसारखा मोठा अपघात झाला तर त्यात ज्यांची हानी होईल ती या केंद्राला ज्यांनी यंत्रसामुग्री पुरवली त्यांच्याकडून भरून घ्यावी आणि यंत्र पुरवणा-या कंपन्यांनी पन्नास साठ वर्षे मुदतीसाठी तशी हमी द्यावी अशी तरतूद या प्रस्तावित कायद्यात आहे असे म्हणतात. अशा प्रकारची हमी कोणतीही कंपनी देईल किंवा देऊ शकेल अशी शक्यता कमी आहे आणि ऑर्डर मिळवण्यासाठी नाइलाजाने कोणी ती दिली तरी वेळ आलीच तर तसली अवाढव्य रक्कम ती कंपनी कोठून उभी करणार आहे हा मोठा प्रश्न आहे.
चेर्नोबिलला हा अपघात कशामुळे झाला हे सर्वांना माहीत आहे आणि त्यातील यंत्रसामुग्री पुरवणा-या कारखान्याची त्यात काही चूक होती किंवा त्या यंत्रांमध्ये काही उणीव होती अशातला भाग नाही. भारतातच नव्हे तर सर्व जगात त्यानंतर उभारल्या जात असलेल्या सर्व अणुकेंद्रांमध्ये अगणित संरक्षक व्यवस्था ठेवलेल्या असतात आणि त्या अपघाताची झळ जनतेला लागू नये याची सदोदित काळजी घेतली जात असते. त्यामुळे असे नुकसान होण्याची शक्यता अत्यल्प आहे. पण कायदे करून त्याची भरपाई यंत्रांच्या उत्पादकांकडून मिळवण्याची शक्यता त्याहून कमी दिसते. इतर कोणत्याच क्षेत्रात अशी तरतूद नसतांना अणुविद्युत क्षेत्रात असे निर्बंध लावण्याचा आग्रह धरणे सुसंगत वाटत नाही आणि असले कायदे जागतिक न्यायालयासमोर टिकतील असे वाटत नाही. मात्र ही नसती ब्याद नको म्हणून अशी संयंत्रे बवनणारे कारखाने तिकडे पाठ फिरवतील आणि विद्युत उत्पादन करण्याची एक चांगली संधी आपण गमावून बसू एवढेच होण्याची शक्यता आहे.

Tuesday, August 24, 2010

पंपपुराण द्वितीय खंड - ८



आजच्या जगात नट आणि बोल्ट या वस्तू आपल्या सर्वांच्या ओळखीच्या असतात. या दोन्हींमध्ये हेलिकल आकाराचे आटे असतात. बोल्ट किंवा स्क्रूला हे आटे बाहेरच्या बाजूला असतात आणि नटाला एक गोल छिद्र पाडून त्याच्या आतल्या अंगाने हे आटे बनवलेले असतात. हे आटे एकमेकांना पूरक असल्यामुळे नट आणि बोल्ट एकमेकांमध्ये चांगले गुंतवता येतात. त्यानंतर बोल्टाला स्थिर धरून नट फिरवला की तो गोल गोल फिरत बोल्टाच्या आधाराने मागे किंवा पुढे सरकतो आणि नटाला स्थिर धरून ठेवले आणि तो बोल्ट गोल फिरवला तर तो फिरता फिरता मागे पुढे सरकतो हे सर्वांनी पाहिले असते. पण जर हा बोल्ट एका साध्या गोल छिद्रात घालून फिरवला, तर तो नुसता स्वतःभोवती फिरेल, मागे किंवा पुढे सरकणार नाही. त्या बोल्टवर कोरून काढलेले हेलिकल आटे आणि ते सरळ छिद्र यामध्ये असलेली रिकामी जागासुध्दा एका हेलिक्सच्या आकाराची असते. बोल्टच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे ही मोकळी जागासुध्दा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालत असते. मात्र त्या जागेत असलेली हवा, पाणी किंवा बारीक कण बोल्टाच्या आट्यांमुळे मागे किंवा पुढे ढकलले जातात.

या तत्वाचा उपयोग स्क्रू कन्व्हेयर्समध्ये केला जातो. धान्य, पीठ, सिमेंट, साखर यासारखे ढीग करता येण्याजोगे पदार्थ इकडून तिकडे करण्यासाठी असे कन्व्हेयर्स वापरतात. साध्या नटबोल्टमधले आटे समान आकाराचे असतात आणि त्यांना एकमेकात गुंतवल्यावर फारशी रिकामी जागा शिल्लक रहात नाही. या कन्व्हेयर्समध्ये या जागेचाच उपयोग करायचा असल्यामुळे स्क्रूचे दाते पातळ बनवून रिकामी जागा वाढवली जाते. घर्षण कमी करण्याच्या दृष्टीने घनपदार्थ वाहून नेणारे कन्हेयर्स अत्यंत धीम्या गतीने चालवावे लागतात. बहुतेक वेळा कन्व्हेयर्सची स्क्रूसारखी पाती आणि त्यांच्या भोवती असलेले बॅरल या दोन्ही गोष्टी पत्र्यापासून तयार केल्या जातात. त्यांचा एकमेकांना स्पर्श होऊन बिघाड होऊ नये म्हणून त्यात पुरेशी मोकळी जागा ठेवली असते.

या तत्वाचा उपयोग पंप आणि काँप्रेसरमध्येसुध्दा करता येतो. द्रव पदार्थांच्या वहनासाठी पंपाचा आणि वायुरूप पदार्थांसाठी काँप्रेसरचा उपयोग केला जातो. हे पदार्थ तरल असल्यामुळे बॅरल आणि स्क्र् यामध्ये जास्त फट ठेवली तर त्यातून ते परत मागे जाऊ शकतात. पंपाचा दांडा संथ गतीने फिरवला तर त्यांना मागे जाण्यासाठी अवधी मिळतो. यामुळे पंपाची कार्यक्षमता कमी होते. हे टाळण्यासाठी पंपाची रचना करतांना द्रवाला ही संधी मिळू नये असा विचार केला जातो. कांही डिझाइन्समध्ये बॅरलच्या आत एक रबराचे लाइनर असते. स्क्रू जवळजवळ त्याला स्पर्श करत फिरतो. या लाइनिंगमध्ये हेलिकल आकार देऊन द्रवाला फिरत फिरत पुढे सरकण्याला मदत केली जाते. पंपाचा दांडा वेगाने फिरवला जात असल्यामुळे त्यावरले आटे द्रवाला पुढच्या बाजूला ढकलत राहतात.

कांही स्क्रू पंपांमध्ये फक्त एकच स्क्रू फिरत असतो तर कांहींमध्ये दोन स्क्रूंची जोडी असते. ही जोडी गिअर पंपासारखे काम करते. या प्रकारात संतुलन सांभाळले जाते. तिस-या एका प्रकारात इंपेलरलाच स्क्रूसारखा आकार दिला जातो. त्यातून इंपेलरच्या मुखात शिरता शिरता द्रवाचा दाब वाढत जातो. या पंपाची गणना मात्र सेंट्रिफ्यूगल प्रकारात होते.

Saturday, August 21, 2010

पंपपुराण द्वितीय खंड - ७



व्हेन पंपामध्ये असलेल्या चक्रावरील व्हेन्स फिरता फिरता केसिंगमधील द्रवाला ढकलत बाहेर काढतात. वरील चित्रात दाखवलेले गीअर पंप आणि लोब पंपसुध्दा साधारणपणे याच तत्वावर काम करतात. मात्र या पंपामध्ये गीअर किंवा लोब्सच्या जोड्या बसवलेल्या असतात. यातील गीअरचे दाते क्रमाक्रमाने एकमेकात ग्ंतत आणि एकमेकांपासून विलग होत असतात. कोणत्याही यंत्रातल्या चाकाची गती कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अशीच रचना असते. मात्र गीअर पंपामधील दोन्ही चक्रे समान गतीने पण उलट दिशांनी फिरत असतात. केसिंगच्या मधल्या भागातले गीअरचे दाते एकमेकात गुंतत किंवा सुटत असतात त्याच वेळी विरुध्द बाजूचे दाते आपल्यासमोर असलेल्या द्रवाला पुढे ढकलत नेतात. या भागात गीअरचा दाता आणि केसिंगमध्ये अरुंद जागा असल्यामुळे हा द्रव केसिंगच्या डावीकडच्या भागातून उजवीकडच्या बाजूला येतो. डाव्या बाजूला असलेल्या दारातून तो केसिंगमध्ये येतो आणि उजव्या बाजूच्या पोर्टमधून बाहेर पडतो.

गीअर पंपामधून मोठ्या प्रमाणात प्रवाह निर्माण होत नाही, तसेच फार मोठा दाबसुध्दा निर्माण होत नाही. द्रवाला फक्त इकडून तिकडे ढकलण्याचे काम त्यातून होते. गिअर्समध्ये घर्षण होऊन झीज होऊ नये यासाठी त्या द्रवात लुब्रिकेटिंगचा गुण असणे आवश्यक असते. हा द्रव अतीशय तरल असला तर गीअरच्या दात्यांना त्यामधून फिरू देईल, त्यांच्याकडून ढकलला जाणार नाही. यामुळे जरासे चिकट किंवा व्हिस्कस अशा द्रवपदार्थांसाठी या पंपाचा उपयोग होऊ शकतो आणि वंगण, ग्रीज, मलम वगैरेंच्या कारखान्यात किंवा यंत्रांचे लुब्रिकेशन करण्याच्या योजनेत तसा तो केला जातो.

लोब पंपामध्ये पाकळ्यासारखे दोन, तीन किंवा चार लोब्स दोन वेगवेगळ्या शाफ्ट्सना जोडलेले असतात. ते एकाच गतीने पण विरुध्द दिशांनी फिरवले जातात. दोन गिअर्सचे दाते एकमेकांना ढकलत फिरतात. त्यातील एका चक्राला मिळालेली गती दुस-या चाकाला देण्याच्या कामासाठी नेहमी गिअर्सचा वापर होत असतो. तसे हे लोब्स करत नाहीत. त्यांना जोडलेल्या शाफ्ट्समार्फत ते समान गतीने पण वेगवेगळे फिरवले जातात. ते एकमेकांना स्पर्शही करत नाहीत. पण फिरता फिरता दोन्ही लोब्स केसिंगमधील द्रवाला डाव्या बाजूच्या पोकळीतून उजव्या बाजूच्या पोकळीत ढकलम्याचे काम करत असतात. या पंपातले लोब्स द्रवाबरोबरच त्यात असलेल्या लहान सहान घन तुकड्यांनासुध्दा ढकलू शकतात. त्यामुळे सॉस, जॅम, लोणची यासारख्या खाद्यपदार्थांच्या कारखान्यात हे पदार्थ एका पात्रामधून दुस-या पात्रात टाकण्यासाठी आणि कॅन किंवा बाटल्यात भरण्यासाठी लोब पंपाचा उपयोग केला जातो. अर्थातच त्यातील सर्व भाग स्टेनलेस स्टीलसारख्या स्वच्छ धातूपासून तयार केले जातात.

Tuesday, August 17, 2010

आज स्टेशनवरनं ..............

आज स्टेशनवरनं बोल तू नवरा कुनाचा येतो ?

त्याच्या करवल्या गो, करवल्या फॅशनवाल्या
कोनी नेसल्यानि गो, नेसल्यानी सलवार कुर्त्या
कोनी घातल्यानि गो, कॅप्री नी प्यांटीवर टॉप्स
त्यांच्या केसांच्या गो, केसांच्या छानछान स्टाइल्स
त्याला लावल्यानि गो, लावल्यानी रिबिनीन् क्लिप्पा
त्यांनी कानात गो, घातल्यानि मॅचिंग रिंगा
त्यांनी लावल्यानि गो, ओठांना लाल लाल लिपस्टिक
त्या चालल्यात गो, चालल्यात टिकटॉक टिकटॉक

आज स्टेशनवरनं बोल तू नवरा कुनाचा येतो?
त्याचा बापूस गो, बापूस लई मोठा विंजनेर
त्याने बांधिल्यान गो, बांधील्यान बिल्डिंगा हज्जार
त्याची वरमाय गो, दिसतिया ठसक्यात भारी
तिनं नेसलीनि गो, नेसलीनी भरजरी सारी

आज स्टेशनवरनं बोल तू नवरा कुनाचा येतो?
त्याचे व-हाडी गो, व-हाडी आलेयत् कोनकोन
कार जीपांमदी, आनी बशीत आलंया भरून
काका काकू आत्या, मामा मामी मावश्या आज्या
सगले नटून थटून, करतात मज्जा मज्जा

त्याचे मैतर गो मैतर आयटीवाले
आज इंडियात गो, उद्या फारीनला चालले
त्यांनी आनल्यानगो, आनल्यान व्हीडिओ कैमरे
क्लिक क्लिक करीत गो, शूटिंग करतायेत सारे

आज स्टेशनवरनं बोल तू नवरा कुनाचा येतो?
नवरा कुनाचा येतो?
नवरा कोनचा येतो?
.
.
.
. . . यागो दांड्यावरनं या लोकप्रिय कोळीगीतावरून

Sunday, August 15, 2010

पंपपुराण द्वितीय खंड - ६



सेंट्रिफ्यूगल पंपामधला इंपेलर स्वतःभोवती गरागरा फिरतांना त्याची वक्राकार पाती त्यातील द्रवाला व्होल्यूट केसिंगच्या परीघाकडे फेकतात आणि तो द्रव इंपेलरच्या भोवती फिरू लागतो. शंखाच्या आकाराच्या त्या व्होल्यूट चेंबरच्या कडेकडेने फिरता फिरता संधी मिळताच तो द्रव पंपाच्या मुखामधून (डिस्चार्ज पोर्टमधून) पंपाबाहेर पडतो. पिस्टन पंपामधील प्लंजर किंवा पिस्टन दंडगोलाकृती सिलिंडरच्या आत मागे पुढे सरकत असतो. ज्या वेळी पिस्टन मागे खेचला जातो तेंव्हा एका पोर्टमधून द्रव सिलिंडरमध्ये शिरतो आणि जेंव्हा पिस्टन पुढे जातो तेंव्हा तो सिलिंडरमध्ये असलेल्या द्रवाला दुस-या पोर्टमधून बाहेर ढकलत नेतो. व्हेन पंपामध्ये या दोन्हीचा थोडा थोडा अंश असतो. या पंपामधली रिंग इंपेलरप्रमाणेच गरगर फिरते, पण त्यावर बसवलेले व्हेन्स एकाद्या पिस्टनप्रमाणे आपल्यासोबत द्रवाला पुढे ढकलत नेतात. त्यासाठी याची रचना वेगळ्या प्रकारे केली जाते.

व्हेन पंपाच्या केसिंगच्या आत एक रिंग फिरत असते. ही रिंग केसिंगमधली जवळ जवळ सर्व जागा व्यापण्याइतक्या मोठ्या आकाराची असते. त्या दोन्हींच्या मध्ये एक अरुंद अशी मोकळी जागा असते. या पंपाचे केसिंग लंबवर्तुळाकार (इलिप्टिकल) किंवा वर्तुळाकार असते. पण वर्तुळाकार असले तर त्या वर्तुळाचा मध्यबिंदू आणि गोल फिरणा-या रिंगचा मध्यबिंदू वेगळ्या ठिकाणी असतात. त्यामुळे ही पोकळी सर्वत्र समान नसून तिचा आकार बदलत असतो. रिंगमध्ये सूर्याच्या किरणासारखे मध्यापासून बाहेरच्या दिशेने जाणारे खाचे (रेडियल स्लिट्स) केलेले असतात. छोट्या चौकोनी तुकड्यांच्या आकाराचे व्हेन्स या स्लिट्समध्ये सैलसे बसवलेले असतात. यातली प्रत्येक व्हेन तिच्या स्लिटमध्ये सहजपणे मागे पुढे सरकू शकते.

जेंव्हा ही रिंग गरगर फिरते तेंव्हा सेंट्रिफ्यूगल फोर्समुळे सर्व व्हेन्स बाहेरच्या बाजूला फेकल्या जातात. केसिंगपर्यंत बाहेर जाऊन त्याला टेकल्यानंतर केसिंगला आतल्या बाजूने घासत घासत त्या व्हेन्स फिरत राहतात. वरील चित्र पाहिल्यास उभ्या रेषेत असलेली व्हेन बरीचशी स्लिटच्या आत दिसते आणि तिचा अगदी थोडा भाग बाहेर आलेला आहे, पण आडव्या रेषेमधील व्हेनचा जास्त भाग स्लिटच्या बाहेर आलेला दिसतो. रिंग फिरत असतांना या क्रियेत दोन व्हेनमधील मोकळी जागा आलटून पालटून काही काळ लहान लहान होत जाते आणि काही काळ वाढत जाते हे वरील चित्रावरून दिसेल. सेंट्रिफ्यूगल पंपाचे इनलेट पोर्ट इंपेलरच्या मधोमध असते तसे व्हेन पंपाचे नसते. त्याची इनलेट आणि आउटलेट ही दोन्ही पोर्ट्स त्याच्या परीघावरच असतात. रिंग फिरत असतांना ज्या काळात व्हेन्समधील जागा वाढत जाते त्या काळात इनलेट पोर्टमधून द्रव केसिंगमध्ये येतो आणि दुस-या काळात ही जागा लहान लहान होत असतांना आतला द्रव आउटलेट पोर्टमधून बाहेर ढकलला जातो. रिंगला अनेक व्हेन्स जोडलेल्या असल्यामुळे एकापाठोपाठ वेगवेगळ्या व्हेन्समधून ही क्रिया होत राहते आणि द्रवाचा प्रवाह वहात राहतो.

सेंट्रिफ्यूगल पंपाच्या मानाने व्हेन पंपाच्या केसिंगमधली जागा अतीशय लहान असते. त्यामुळे या प्रकारच्या पंपामधून द्रवाचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर होऊ शकत नाही. पण ढकलला जात असलेल्या थोड्याशा द्रवाला सुध्दा पंपाच्या बाहेर पडण्यात अडथळा आला तर त्याचा दाब वाढत जातो. म्हणूनच या पंपाचा समावेश पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट या प्रकारात होतो. द्रवपदार्थाचा दाब वाढवून त्या दाबाचा उपयोग कार्य करण्यासाठी करायचा असेल तर अशा कामासाठी या पंपाचा उपयोग करतात. उदाहरणार्थ एक्स्केव्हेटर्स, यांत्रिक नांगर, डंपर वगैरे जी मशिनरी हैड्रॉलिक फोर्सवर चालते त्यात व्हेन पंपाचा उपयोग करण्यात येतो.

या पंपातल्या व्हेन्सचे स्लिट्स आणि केसिंग यांच्याबरोबर सतत घर्षण होत असते. त्यात त्यांची झीज होऊ नये यासाठी त्या अत्यंत कणखर आणि गुळगुळीत बनवल्या जातात. तसेच या पंपातला द्रवपदार्थ सुध्दा वंगणयुक्त असावा लागतो. त्यात साधे पाणी वापरल्यास घर्षणामुळे निर्माण झालेल्या ऊष्णतेमुळे त्याची वाफ होऊन जाईल आणि घर्षण वाढून रिंग फिरवण्यासाठी जास्त शक्ती लागेल, शिवाय पंपाचे निरनिराळे भाग झिजून जातील. या कारणांमुळे व्हेन पंपांचा उपयोग पाण्यासाठी सहसा करत नाहीत. हैड्रॉलिक मशीनरीतील तेलाचा दाब वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या पंपांचा उपयोग करतात.

या पंपाचे लंबवर्तुळाकार केसिंग तयार करण्यासाठी विशेष प्रकारची यंत्रसामुग्री लागते. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले तर ते परवडते. एक्सेंट्रिक वर्तुळाकार बनवणे त्या मानाने थोडे सोपे असते. पण या प्रकारात व्हेनच्या रिंगवर पडणारे फोर्सेस संतुलित नसतात. तसेच एका बाजूच्या व्हेन्स जास्त बाहेर आलेल्या असल्यामुळे त्याचा बॅलन्स किंचित ढळलेला असतो. या गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

व्हेन पंपाचा आणखी एक प्रकार आहे. यातल्या व्हेन रबरासारख्या स्थितीस्थापक व लवचीक पदार्थापासून तयार करतात. या व्हेन्स आपल्या खाचांमध्ये पक्क्या बसवलेल्या असतात. त्या मागे पुढे सरकत नाहीत, तर गरजेनुसार लवत आणि सरळ होत असतात. आत शिरणा-या द्रवाच्या दाबाने झुकून या व्हेन्स त्याला केसिंगमध्ये प्रवेश करू देतात, पण पुढ्यातल्या द्रवाच्या दाबाने ताठ होऊन त्या द्रवाला केसिंगच्या बाहेर ढकलतात.

पिस्टन पंपातला प्लंजर सिलिंडरला घासत पुढे मागे होत असतो आणि त्याप्रमाणेच व्हेन पंपातल्या व्हेन्स केसिंगला स्पर्श करून फिरत असतो. यात एकादा वाळूचा किंवा कोणत्याही कठीण वस्तूचा कण आला तर तो या यंत्रांच्या फिरण्यात अडथळा आणतो आणि अधिक शक्ती लावून यंत्र फिरवलेच तर त्या कठीण कणामुळे रेघोट्या पडून ते यंत्र निकामी होऊ शकते. या कारणामुळे या दोन्ही प्रकारच्या पंपांमध्ये येणारा द्रव आधीच काळजीपूर्वक गाळून घ्यावा लागतो. अत्यंत सक्षम असे फिल्टर त्यासाठी पंपाच्या इनलेटला जोडलेले असतात. अगदी मायक्रोन म्हणजे एका मिलिमीटरचा एक सहस्रांश भाग एवढा सूक्ष्म कणसुध्दा ज्यातून पलीकडे जाणार नाही इतके चांगले फिल्टर उपलब्ध आहेत. अर्थातच ते बरेच महाग असतात आणि कच-याने भरून फारच लवकर निकामी होऊ शकतात. त्यामुळे ऑइल हैड्रॉलिक सिस्टिममध्ये वापरण्यात येणा-या द्रवपदार्थाचे शुध्दीकरण हाच एक वेगळा विषय असून त्यासाठी खास यंत्रणा करावी लागते.

Tuesday, August 10, 2010

कौटुंबिक संमेलन - ७ (अंतिम)


मधुकरला पहिल्यापासूनच नाटकाची आवड आणि अभिनयाचे अंग असल्यामुळे तो गेली चाळीस पन्नास वर्षे या क्षेत्रात वावरतो आहे. बरीच वर्षे हैद्राबादला असतांना तो तिथल्या महाराष्ट्रमंडळाचा अत्यंत उत्साही आणि सक्रिय कार्यकर्ता होता. दरवर्षी नवनवी नाटके बसवून तिथल्या मराठी समाजापुढे सादर करण्यात तो नेहमीच पुढाकार घेत असे. पुण्याला स्थायिक झाल्यानंतरही तो त्याच्या वसाहतीतील सांस्कृतिक विश्वात सक्रिय आहे. आमच्या कौटुंबिक संमेलनात त्याच्या अभिनयकौशल्याची झलक दाखवायचे ठरलेलेच होते, पण शनिवारी रात्री झालेल्या विविधगुणदर्शनाच्या कार्यक्रमात संगीताचेच प्राधान्य होते आणि शांतीवनातल्या छोट्याशा मंचावर मांडलेली वाद्ये बाजूला करून मोकळी जागा करणे व पुन्हा ती सारी मांडून त्यांची विजेशी जोडणी करणे बरेच कठीण होते. त्यामुळे मधुकरचा नाट्याविष्काराचा कार्यक्रम रविवारी सकाळी करायचे ठरवले. त्या दिवशीही अनपेक्षितपणे वीज गेली. तरीही मायक्रोफोनच्या मदतीशिवाय त्याने शारदा नाटकातला एक प्रवेश अप्रतिम पध्दतीने सादर केला. त्यातल्या निरनिराळ्या पात्रांच्या बोलण्यातल्या वेगवेगळ्या लकबी आणि हावभावांमधले बारकावे वगैरे सारे त्याने एकट्याने सादर करून शारदा नाटकातला तो प्रसंग केवळ आपल्या अभिनयकौशल्याने जसाच्या तसा उभा करून दाखवला.

नाटकांचे लेखन, दिग्दर्शन, अभिनय वगैरे सबकुछ जबाबदा-या प्रभाकर एकट्याने पेलतात. त्यांनी स्वतः लिहिलेल्या आणि बसवलेल्या एका नाटकातला प्रवेश त्यांनी सादर केला. त्या नाटकाचे कथानक, त्यातली पात्रे आणि तो विशिष्ट प्रसंग वगैरेंचे मार्मिक विवेचन करून त्यांनी नाट्यसृष्टीतले अंतरंग थोडेसे उलगडून दाखवले. नटाने नाटकातल्या एकाद्या भूमिकेत शिरणे वगैरे सगळ्या गप्पा असतात, तसे करणे शक्य तर नसतेच आणि इष्टही नसते, कोणीही तसे प्रत्यक्षात करत नाही. आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि शब्दांच्या फेकीतून तसा आभास तो निर्माण करतो. नाटक पहातांना आपल्यालाही त्या नटाचे अस्तित्व जाणवल्याशिवाय रहात नाही. असे त्यांनी ठामपणे सांगितले. मागे एकदा पुलंच्या एका मुलाखतीत त्यांनीसुध्दा असेच काहीतरी सांगितल्याचे मला आठवते.

सुधा, शैला वगैरेंनी त्यांच्या बालपणातल्या काही डोळ्यात पाणी आणणा-या हृदयस्पर्शी आठवणी तर गुदगुद्या करणा-या काही खुसखुशीत हकीकती सांगितल्या. इतरांनीही त्यात भर घातली. पंचवीस वर्षांपूर्वी आमच्या आईने रचलेले अंबरीशाचे आख्यान सरोजला अजून तोंडपाठ आहे. ते तिने केवळ स्मरणातून पूर्ण ऐकवले. आईने केलेल्या आणखी कांही निवडक कवनांचे मी वाचन केले. नंतर आपण केलेले एक विडंबनही वाचून दाखवले. मानसीने रंगवलेल्या अप्रतिम चित्रांचे एक लहानसे प्रदर्शन त्या हॉलमध्ये भरवले होते. तिने काढलेली सुंदर चित्रे त्यासाठी रंगमंचावरील पडद्यावरच चिकटवली किंवा टाचली होती. प्रभाकरांनी आपल्या सुवाच्य अक्षरात लिहून आणि रेखाचित्रांनी सजवून प्रदर्शनात ठेवलेल्या कवितांचे नमूनेही हॉलमधल्या भिंतीवर लावले होते.

या प्रसंगी आलेल्या ज्येष्ठ सदस्यांचा त्यांच्या नातवंडांकडून सत्कार करण्यात आला. एक पुष्पगुच्छ आणि नारळ देणे आणि वाकून नमस्कार करणे एवढेच त्याचे स्वरूप होते. ज्यांची नातवंडे हजर नव्हती त्यांचा सत्कार त्यांच्या कुटुंबातल्या तिथे आलेल्या सर्वात लहान असलेल्या व्यक्तींनी केला. या कार्यक्रमाचे संयोजन आणि त्यासाठी सारी धावपळ करणा-या युवकांचाही नामनिर्देश करून वडिलधा-यांच्या हस्ते त्या सर्वांना फूल आणि नारळ दिले. तोपर्यंत भोजनाची व्यवस्था झाली असल्याची वर्दी आली.

पुण्यातले कांही लोक जेवणासाठी शांतीवनात न थांबता सरळ आपल्या घरी परतले आणि बाहेरगावाहून आलेले काही लोक जेवण आटोपून लगेच परतीच्या प्रवासाला निघाले. त्यामुळे भोजनोत्तर कार्यक्रमासाठी अर्धेच लोक शिल्लक राहिले होते. त्यांनाही परत जावेसे वाटायला लागले होते, पण त्यानंतर जादूचे प्रयोग असल्याची घोषणा केली गेल्यामुळे छोट्या मुलांनी त्यांना जाऊ दिले नाही. हा खेळ शांतीवनातर्फे दाखवला जाणार होता. सर्वांनी भोजनालयात जाऊन आणि जेवण करून परत हॉलमध्ये येईपर्यंत स्टेजवर टेबल ठेवून जादूच्या खेळाची तयारी सुरू झाली होती, पण विजेचा मात्र पत्ता नव्हता. आता मात्र ती येईपर्यंत थांबून तिची वाट पहायची कोणाचीही तयारी नव्हती आणि जादूगारालासुध्दा संध्याकाळी आणखी कुठे जायचे असावे. त्यानेही लाइटिंग आणि माइकशिवायच प्रयोग सुरू करून दिला. कदाचित त्याच्यासाठी हे रोजचेच असेल. तुकडे तुकडे केलेल्या रिबीनीमधून अखंड रिबीन काढून दाखवणे, एकादी वस्तू टेबलावरून अदृष्य करून कोणाच्या खिशातून किंवा टोपीतून ती बाहेर काढणे, रिकाम्या थैलीमधून कबुतरे काढणे वगैरे हातचलाखीचे नमूने दाखवून त्याने छान मनोरंजन केले. यातली ट्रिक शोधून काढण्याचा निष्फळ प्रयत्न करण्यापेक्षा त्या जादूगाराच्या हुषारीची मजा घेत त्याला दाद देणेच मी जास्त पसंत करतो. मुलांना तर ते खरेच वाटते आणि ती विस्मयचकित होतात.

जादूचे प्रयोग संपल्यावर मात्र तिथे जास्त वेळ थांबायची कोणाची तयारी नव्हती. पावसाचा जोर वाढतच होता आणि तो कमी होण्याची लक्षणे दिसत नव्हती. रविवारी संध्याकाळी खडकवासला धरणाच्या काठावर पिकनिकला किंवा भटकंतीला येणा-या पर्यटकांची भरपूर गर्दी असणार हे माहीत होते. त्यामुळे शक्य तितक्या लवकर निघणे चांगले होते. परतीच्या प्रवासात कोणाकोणाच्या गाडीत कोणाकोणाला घ्यायचे याची चर्चा करून ते नक्की केलेले होतेच. आमच्या गाडीमधल्या पॅसेंजरांना गोळा करून आम्हीही परतीला निघालो. बरोबर नेलेल्या सगळ्या सामानाची आवराआवर करून आणि बिले भागवणे वगैरे उरलीसुरली कामे आटोपून शेवटची बॅचसुध्दा तासाभरात परतली.

औपचारिक रीतीने या कार्यक्रमाचा समारोप सोहळा असा झाला नाही. टेलीफोनवर आणि ईमेल, ऑर्कुट, फेसबुक वगैरे माध्यमातून एकमेकांशी संवाद चालत राहिला आणि अजून तो चालला आहे. एकंदरीत पाहता मजा आली असाच सूर यातून निघत आहे.


. . . . . . . . . . . . .. . . . . . . . . . . . (समाप्त)

Monday, August 09, 2010

कौटुंबिक संमेलन - ६

खडकवासला धरणाच्या विस्तीर्ण तलावाच्या किनारीच पानशेतकडच्या बाजूला असलेल्या डोंगराच्या उतारावर शांतीवन उभे केले आहे. सरोवराच्या काठी रम्य दृष्य आहेच, शिवाय मुलांना खेळण्यासाठी अनेक प्रकारची व्यवस्था आहे. रविवारी सकाळच्या वेळी सर्वांनी तिथल्या निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आस्वाद घेत हिंडावे, फिरावे, मुलांनी खेळावे, बागडावे यासाठी भरपूर वेळ दिला होता. त्यानंतर हॉलमध्ये कांही पार्टी गेम्स खेळायचे योजले होते. दुपारचे जेवण झाल्यानंतर पुन्हा सर्वांनी थोडा वेळ एकत्र बसून जुन्या आठवणी, मजेदार अनुभव, पुढील योजना, सूचना, मार्गदर्शन, चर्चा वगैरे ज्याला जे योग्य वाटेल ते करण्यात तो वेळ सत्कारणी लावायचा आणि चहापानानंतर परतण्यासाठी प्रस्थान करायचे अशी या कार्यक्रमाची सर्वसाधारण रूपरेषा आखली होती. पण पाऊस आणि वीजकपात या गोष्टींनी येत गेलेल्या अडथळ्यांमुळे त्यात बरेच बदल करावे लागले.

आदले दिवशी झोपायला उशीर झाल्यामुळे रविवारी सकाळी लवकर उठण्याची कोणालाच घाई वाटली नाही. ढगाळ हवामानामुळे दिवसाचे उजाडणे मंदच होते. त्या दिवशी लख्ख ऊन पडलेच नाही. त्यामुळे ते अंगावर येण्याचा प्रश्नच नव्हता. एकमेकांच्या आवाजानेच आजूबाजूचे लोक हळूहळू जागे झाले. प्रातर्विधीसाठी थोड्या अंतरावर वेगळा टॉयलेट ब्लॉक होता. त्यात टॉयलेट्सची पुरेशी संख्या असल्यामुळे चाळीत राहणा-या लोकांप्रमाणे लाइनीत नंबर लावून उभे राहण्याची गरज पडत नव्हती. पण गीजर, शॉवर वगैरेंनी युक्त असे पाश्चात्य पध्दतीचे अटॅच्ड बाथरूम बेडरूममध्येच असलेल्या घरात रहात असल्यामुळे त्याची संवय झाली आहे आणि नुसता पंचा गुंडाळून बाहेर फिरायला लाज वाटते. त्यामुळे बाहेर जाण्यायोग्य कपडे अंगावर चढवून आणि हातात छत्री घेऊन तिथपर्यंत जाणे येणे अडचणीचे वाटले. हवेतल्या गारव्यामुळे आंघोळ करण्याची आवश्यकता कमी झाली होती. त्यातून आंघोळ करण्यासाठी पावसामध्ये आणखी एक फेरी मारण्यापेक्षा गोळ्या घेणेच बरे असे अनेक जणांनी ठरवले.

नाश्त्यासाठी डायनिंग हॉलला भेट देणे गरजेचे होते. गरम गरम इडल्यांचे घाण्यावर घाणे येत होते. प्रत्येकाने किती इडल्या खायच्या यावर बंधन नसले तरी इतरांनी हावरट म्हणू नये म्हणून सगळ्यांनी आधी फक्त दोन दोनच इडल्या प्लेटमध्ये वाढून घेतल्या आणि त्या संपल्यानंतर कोणी इडलीची, कोणी सांबाराची तर कोणी चटणीची तारीफ करीत बहुतेक जणांनी आपल्या प्लेट पुन्हा भरून आणल्या.
न्याहारी झाल्यानंतर बहुतेक मंडळी थोडा वेळ इकडे तिकडे हिंडून परत आली, पण पाऊस आणि निसरडे रस्ते यांना पाहून तशा अवस्थेत चढउतार करण्याचे धाडस करण्याचे वयस्क लोकांनी टाळले. थोड्या वेळाने जेंव्हा सारे लोक हॉलमध्ये परत आले तेंव्हा दोन चार चेहेरे दिसत नव्हते. ते लोक सकाळी उठल्यानंतर लगेच अंतर्धान पावले होते असे समजले. त्यांच्यामधल्या कोणाची प्रकृती ठीक नव्हती आणि कोणाला अधिक महत्वाचे काम होते. त्यामुळे सर्वांच्या भेटीगाठी होण्याचा मुख्य उद्देश सफळ झाल्यानंतर जास्त गाजावाजा न करता ते पुण्याला परत गेले होते. पावसाचा जोर वाढतच होता, वीज कधी येत होती, कधी जात होती याचा भरवसा नव्हता. सर्वांना रात्री मुक्कामाला वेळेवर आपापल्या गावाला जाऊन पोचणे श्रेयस्कर वाटत होते आणि पावसामुळे प्रवासात कोणत्या अडचणी येऊ शकतील ते सांगता येत नव्हते. त्यामुळे बाहेरगांवाहून आलेल्या बहुतेक सर्व मंडळींनी जेवण झाल्यानंतर लगेच निघण्याचा निर्णय घेऊन तो सांगून टाकला.

आता हातात असलेल्या दीड दोन तासांमध्ये काय करायचे याचा पुनर्विचार केला गेला. शनिवारी संध्याकाळी आलेल्या सदस्यांची ओळख करून देतांना वीज गेल्यामुळे प्रेझेंटेशनचा अखेरचा थोडा भाग दाखवायचा राहून गेला होता. शिवाय परांजप्यांची मोटर वाटेत नादुरुस्त झाल्यामुळे ते कुटुंब शांतीवनात उशीरा येऊन पोचले होते. त्यांची ओळख करणे आणि जोशी कुटुंबाची माहिती दाखवायचे राहिले होते. हे पाहता आदले दिवशी दाखवलेल्या प्रेझेंटेशनच्या स्लाइड्स पुन्हा एकदा भराभर दाखवल्या. परांजपे कुटुंबाची स्लाइड आल्यावर त्यांची सविस्तर ओळख करून घेतली आणि राहून गेलेला भाग पूर्णपणे दाखवला. या प्रेझेंटेशनमध्ये प्रत्येक कुटुंबामागे पक्त एकच चित्र दाखवले होते, पण या निमित्याने जुन्या फोटोंचा खजिना हाती लागला होता. त्याचे एक वेगळे प्रेझेंटेशन तयार केले होते. ते दाखवतांना प्रत्येक फोटोमधल्या व्यक्ती ओळखणे आणि त्यानंतर एकेकाला त्या काळी कोण होतास, होतीस आणि आता काय झालास, झालीस असे म्हणतांना खूप गंमत आली. आपल्या आईवडिलांना आणि आजीआजोबांना लहान असतांना पहातांना मुलांना तर खूपच मौज वाटत होती. हा प्रोग्रॅम संपण्याच्या आधीच लाइट गेले आणि तो बंद पडला.

वीज गेल्यामुळे प्रोजेक्टरबरोबर माईकही बंद झाला. ऐंशी पंचाऐंशी लोकांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात जो कोणी बोलू शकेल असे लोकच आता काही सांगू शकतील हा एक नवा मुद्दा समोर आला. सर्वांना त्यासाठी शक्य तितक्या जवळ बोलावून कोंडाळे केले. त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. या निमित्याने सर्वांनी सामूहिक आवाजात गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू हा श्लोक म्हणून गुरुवंदना केली. गुरूंचे महात्म्य आणि आपल्या जीवनातले स्थान, आपल्याला ते कोणकोणत्या रूपात भेटतात, आदर्श गुरू शिष्याला कसे घडवतात, तसे गुरू नाही भेटले तरी आपण कोणाकोणाला गुरुस्थानी मानून एकलव्यासारखे विद्याग्रहण करू शकतो, त्यासाठी मनात विनम्रभाव असणे कसे महत्वाचे आहे वगैरेचे थोडक्यात मार्गदर्शन केले.

. . . . . . .. . . . . . . . . . . . . (क्रमशः)

Sunday, August 08, 2010

कौटुंबिक संमेलन - ५


शनिवार रात्रीचे जेवणखाण उरकून सारी मंडळी शांतीवनातल्या हॉलवर परत येईपर्यंत वीज आली होती, रंगमंचावर तबला, पेटी, सिंथेसाइजर, गिटार वगैरे वाद्यांची मांडणी करून ठेवली होती आणि वादक मंडळी तयारीत होती. लोक परत येताच विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सुरू झाला. रात्रीचे साजेदहा वाजून गेले असले तरी अख्खा बालचमू टक्क जागा होता आणि उत्साहाने या कार्यक्रमाची वाट पहात होता. काही मुलांनी त्यासाठी बरीच पूर्वतयारी केली होती. पाच वर्षाच्या निधीने काही उत्कृष्ट कविता आणि गद्य उतारे पाठ करून ठेवले होते, ते अस्खलित वाणीत सादर केले. पाठांतराची आणि सादरीकरणाची तिची क्षमता बघून सगळे थक्क झाले. सहा वर्षाच्या इराला राधा ही बावरी हे गाणे आधीपासूनच तोंडपाठ होते आणि त्या गाण्याची चालही तिच्या ओठावर होती, तरीही आदले दिवशी ती हे गाणे सतत तासभर ऐकत होती. त्यातल्या आआआ, ईईई, एएए वगैरे खास लकेरींच्या जागा आणि रिकाम्या जागा (पॉजेस) लक्षपूर्वक ऐकून तिने घटवून ठेवल्या आणि वादक साथीदारांनी दिलेल्या ठेक्यावर जशाच्या तशा सादर करून तुफान टाळ्या मिळवल्या. तीन साडेतीन वर्षांच्या चिटुकल्या आणि धिटुकल्या प्रियाने बडबडगीते, प्रार्थना, नर्सरी -हाइम्स वगैरे जे जे त्या क्षणी सुचेल ते बिनधास्तपणे गाऊन घेतले. अजय-अतुल यांची गाणी श्रेयस आणि सर्वेश ही भावंडे फर्मास गातात. त्यांचे मल्हार वारी तर अफलातून झाले. केतकी, अक्षय, प्रणीता, सानिका वगैरे इतर मुलांनाही या गाण्यांवरून स्फूर्ती मिळाली आणि त्यांनी एकेकट्याने किंवा समूहात निरनिराळी गाणी गाऊन धमाल आणली. शुभंकरोती ते अग्गोबाई ढग्गोबाई आणि ट्विंकल् ट्विंकल ते ऑल ईज वेल् पर्यंत अनेक लोकप्रिय मराठी, हिंदी आणि इंग्रजी गाणी या मुलांनी म्हंटली. त्यात बालगीते, बडबडगीते ते भक्तीगीते आणि चित्रपटगीते वगैरे सगळ्या प्रकारची गाणी झाली. बहुभाषी तृप्तीने मराठी आणि हिंदीशिवाय कन्नड आणि तामीळ भाषेतली गाणी गाऊन दाखवली. जवळजवळ तासभर मुलांनीच रंगमंच गाजवला.

मुलांचा उत्साह ओसरल्यानंतर मोठ्या लोकांना संधी मिळाली. सुधा आणि अलका या पट्टीच्या गायिकांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन रसिक श्रोत्यांची वाहवा मिळवलेली आहे. त्यांनी त्यांची निवडक गाणी गायिलीच, कांही खास गाण्यांची फरमाईशही त्यांना झाली. प्रशांत आणि प्रिया (मोठी) आता तयार झाले आहेत. उदय, जितेंद्ग आणि मंजिरी यांचे गळे चांगले आहेत आणि त्यांना गाण्याची आवड आहे. त्यांनी थोड्या गाण्यांची तयारी करून ठेवली होती, ती सराईतपणे सादर केली. शिवाय प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अनेकांना आग्रह करकरून एक दोन गाणी म्हणायला लावली. सर्वांचा सहभाग हे या कार्यक्रमाचे मुख्य सूत्र होते. एका लहानशा ग्रुपने कार्यक्रम करायचा आणि इतरांनी तो ऐकायचा असे त्याचे स्वरूप नव्हते. ज्यांना मंचावर यायला संकोच वाटत होता त्यांना बसल्या जागी माईक देण्यात आला. सत्तरीतल्या विजयावहिनी आणि सुलभावहिनी यांनीसुध्दा सुरेल गाणी गायिली.

आमच्याकडल्या संगीताच्या घरगुती बैठकींमध्ये हार्मोनियमची साथ नेहमी प्रभाकर करतात, तशी त्यांनी बराच वेळ केली. अधून मधून इतरांनीही पेटी वाजवून त्यांना विश्रांती दिली. प्रशांतला तबलावादनामध्ये तालमणी हा खिताब मिळालेला आहे. त्याला साजेशी कामगिरी थोडा वेळ करून त्याने तबला डग्गा मीराच्या स्वाधीन केला आणि तो स्वतः सिंथेसाइजरवर बसला. पुढले दोन अडीच तास तबला वाजवून मीराने सर्वांना चकित केले. प्राचीने शास्त्रीय संगीताची झलक दाखवली. मैत्रेय अगदी सुरुवातीपासून अखेरपर्यंत गिटार वाजवून साथ देत होता. त्याने कांही सोलो पीसेसही वाजवून दाखवले. अच्युत, मिलिंद, चैतन्य वगैरे अधून मधून इतर तालवाद्यांवर ठेका धरत होते. यातली गंमत म्हणजे ही सगळी मंडळी वेगवेगळ्या गांवाहून आली होती आणि शांतीवनातल्या स्टेजवरच एकत्र जमली होती. त्यांनी कुठल्याच गाण्यांची आधी प्रॅक्टिस केलेली नव्हती. कोणची गाणी कोण गाणार आहे हेच मुळी ठरलेले नव्हते. संगीतसंयोजन, स्वरलिपी वगैरे प्रकार नव्हतेच. सर्वांनीच आपापल्या हातातली वाद्ये उत्स्फूर्तपणे सुचेल आणि जमेल तशी वाजवूनसुध्दा त्यात सुरेख मेळ जमून येत होता. अशा बैठकांमध्ये सूर ताल लय वगैरेंचा फारसा कीस कोणी काढत नाही, पण गोंगाट आणि संगीत यातला फरक कानाला समजतोच. संपूर्ण कार्यक्रमात गोगाटाचा अनुभव अगदी क्वचित आला आणि बहुतेक वेळ सुरेल संगीतच ऐकायला मिळत गेल्याने त्याची रंगत वाढत गेली.

तबला, पेटी, सिंथेसायजर, गिटार वगैरे वाद्ये आणि वादक मंडळींनी तिथला लहानसा मंच भरून गेला असल्यामुळे नृत्य किंवा नाटक सादर करायला जागाच नव्हती. स्टेजच्या समोर असलेल्या लहानशा मोकळ्या जागेत काही लहान मुले उडत्या चालीच्या गाण्यांच्या तालावर नाचून घेत एवढेच. पण गाण्यांखेरीज इतर काही आयटम सुध्दा या कार्यक्रमात सादर झाले. शुक्रतारा मंदवारा या गाण्याच्या चालीवर प्रसाद आणि सुनीतीने दे आता करुनी चहा हे विनोदी द्वंद्वगीत गाऊन दाखवले तर देहाची तिजोरीच्या चालीवर यशवंत देवांची पत्नीची मुजोरी ही कविता प्रसादने ऐकवली. कोल्हापूर रेडिओस्टेशनवर चालत असलेले पैलवानांच्या शरीरसौष्ठवावरचे भाषण आणि सांगली केंद्रावर चालत असलेली एक पाककृती यातली वाक्ये आलटून पालटून वाचून त्यातून येणारी धमाल या जोडीने ऐकवून पोट धरधरून हसायला लावले. स्वतःचे हंसू आवरून ठरलेली वाक्ये न विसरता गंभीरपणे म्हणणे हे कठीण काम त्यांनी सहज केले. टीव्ही येण्याच्या आधीच्या काळात अशा प्रकारचे विनोदी मिश्रण खूप पॉप्युलर होते. पण जवळ जवळ वेव्हलेंग्थ असलेली दोन आकाशवाणी केंद्रे एकाच वेळी रेडिओवर लागणे शक्य होते, तसे दोन टीव्ही चॅनल लागत नाहीत, शिवाय दृष्य चित्रांची मिसळ करणे जास्त कठीण असते यामुळे रेडिओबरोबरच विनोदाचा हा प्रकार मागे पडत गेला.

कॉलेजकुमार उत्कर्ष मासिकासारखे दिसणारे एक पुस्तक हातात धरून स्टेजवर आला आणि त्याने दोन अर्थपूर्ण कविता वाचून दाखवल्या. प्रसादनंतर लगेचच तो आल्याने त्यानेसुध्दा त्याला आवडलेल्या पण फारशी प्रसिध्दी न मिळालेल्या कविता वाचल्या असाव्यात असे वाटले. त्या कविता त्याने स्वतः रचल्या होत्या, त्याच्या कॉलेजच्या स्मरणिकेत त्या प्रसिध्द झाल्या होत्या आणि प्रत्यक्ष कवीवर्य विंदा करंदीकर यांनी त्याबद्दल त्याला शाबासकी दिली होती हे नंतर बोलण्यातून कळले. माणसाने विनयी असवे, पण आपल्या गुणांची आणि मिळालेल्या यशाची थोडी प्रसिध्दी करावी किंवा खुबीने करवून घ्यावी असा सल्ला मी त्याला दिला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोणीच करत नव्हता. सगळा उत्स्फूर्त मामला होता. पण अधून मधून स्टेजवर येऊन विनोदी चुटके सांगायचे काम मिलिंद करत होता. त्याच्याकडे विनोदी किश्श्यांचा भरपूर स्टॉक होता आणि होऊन गेलेल्या गाण्याशी सांगड घालून त्यातला नेमका जोक नाट्यपूर्ण पध्दतीने सांगण्याचे कसब त्याने आत्मसात केले आहे. त्याच्या खुसखुशीत कॉमेंट्समुळे कार्यक्रमाला जीवंतपणा येत होता.

रंगत गेलेल्या या कार्यक्रमात जेंव्हा सध्याचे टॉपहिट गाणे आता वाजले की बारा सुरू झाले तेंव्हा घड्याळात अडीच वाजले होते. त्यानंतर तो आवरता घ्यायचे ठरले. तरीही आणखी एक आणखी एक असे करत भैरवी संपेपर्यंत तीन वाजले होते. हॉलभर गाद्या बिछवून ठेवल्या असल्याने बरीचशी मंडळी गाणी ऐकता ऐकता जागीच आडवी झाली होती. पाच सहा कॉटेजेसमध्ये ज्येष्ठ सदस्यांची सोय केलेली होती. आपापल्या जागी जाऊन निजानीज होईपर्यंत आणखी अर्धा तास गेला. पाऊस पडतच होता. कॉटेजच्या वर पत्र्याचे छप्पर असल्यामुळे तव्यावर लाह्या फुटाव्यात तसे पावसाचे थेंब त्यावर तडतड करत होते. पावसाच्या जोराबरोबर त्याची लय कमी जास्त होत होती. पण त्या लयीवरच निद्रादेवीची आराधना करत असतांना ती प्रसन्न झाली आणि तिने सर्वांना आपल्या आधीन करून घेतले.


. . . . . . . . (क्रमशः)

Monday, August 02, 2010

कौटुंबिक संमेलन - ४



आमचा हा कौटुंबिक मेळावा २४- २५ जुलैला करायचा ठरवला होता आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातच एक अत्यंत दुःखद अशी घटना घडली. आमच्यातल्या एका अत्यंत घनिष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तीचे म्हणजे विमलताईचे देहावसान झाल्याच्या वृत्ताने सा-या कुटुंबावर शोकाचे सावट पसरले. आता या मेळाव्याचे ठरल्याप्रमाणे आयोजन करावे की करू नये, यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले. पण दुःखाचा पहिला आवेग ओसरल्यानंतर सर्वांनी फोनवर विचारविनिमय केला. पुढच्या पिढीमधल्या मुलांनी पुढाकार घेऊन या मेळाव्याची आखणी केली होती, त्यांच्या, मागल्या आणि पुढल्या पिढीमधल्या लोकांना एकत्र आणण्याचा त्यातला प्रयत्न आणि उद्देश स्तुत्य आणि महत्वाचा होता हे पाहून त्याला हिरवा कंदील मिळाला आणि नियोजित कार्यक्रमाची गाडी पुढे सरकली. पण आमच्या कुटुंबाच्या एका शाखेतून मात्र कोणीच आले नाहीत. ती मंडळी आली असती तर उपस्थितांची एकंदर संख्या सहज शंभरावर गेली असती. या मेळाव्याबद्दल स्वतः विमलताईला खूप इंटरेस्ट होता आणि प्रकृती तितकीशी ठीक नसतांनाही तिथे यायचे ती ठरवत होती. जर तिला ते शक्य झाले असते तर बाकीचेही सगळेच आले असते आणि आमचे संमेलन परिपूर्ण झाले असते. पण काळाला ते मंजूर नव्हते. त्यामुळे निरुपाय झाला.
या मेळाव्यातल्या औपचारिक कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत गांभिर्याने झाली. सभामंचावरील रंगीत पडद्यावर एक शुभ्र बेडशीट लावून तयार केलेल्या कामचलाऊ स्क्रीनवर आधी विमलताईचे छायाचित्र दाखवले. अदृष्यपणे तीसुध्दा त्या ठिकाणी आली असेल अशी मनात कल्पना करून साश्रु नयनांनी तिला भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आणि त्यानंतर मी माझ्या प्रेझेंटेशनची सुरुवात केली. आमच्या पिढीमधल्या सर्वांचे आजोबा आणि आजी यांची थोडक्यात माहिती सांगून त्यांचे वास्तव्य असलेले खेडेगांव नकाशात दाखवले. आमची पिढी त्या गावाच्या जवळपासच्या परिसरात वाढलेली आहे, पण पुढील पिढीमधल्या मुलांपैकी काहीजणांनी तो भाग पाहिला नसण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी त्या भागाची झलक दाखवली. माझ्या वडिलांच्या पिढीमधले सारेच लोक आजोबांचे खेडे सोडून आधी तालुक्याच्या गावात येऊन स्थाइक झाले होते. नंतरच्या काळात सगळे तिथूनही चारी दिशांना पांगले. सत्तर वर्षांपूर्वीच्या एका ऐतिहासिक पण अजूनपर्यंत शाबूत असलेल्या छायाचित्रात मागील पिढीतल्या बहुतेक मंडळींचे दर्शन घडले. ती पिढीसुध्दा आता काळाआड गेली आहे. आमच्या पिढीमधले बरेचजण बालकांच्या स्वरूपात या फोटोत दिसतात. त्यातल्याही कांही व्यक्ती आता नाहीत, तर माझ्यासकट कांही भावंडांचे जन्मसुध्दा तेंव्हा झालेले नसल्यामुळे आम्ही त्या फोटोत दिसत नाही. ही सारी मंडळी जवळची आणि नेहमीच्या पाहण्यातली असल्यामुळे त्यांचे जुने बालरूप पाहून त्यातल्या लोकांना बालपणीच्या अंधुक झालेल्या आठवणी ताज्या झाल्या आणि इतरांना ते खूपच मनोरंजक वाटले.

त्यानंतर आमच्या पिढीमधील एक भाऊ किंवा बहिण आणि तो संपूर्ण परिवार यांची नावे स्क्रीनवर आली की त्यांच्यापैकी जेवढे लोक आले आहेत त्यांनी मंचावर यायचे आणि आपली ओळख करून द्यायची, त्यांच्या परिवाराचे निवडक फोटो दाखवायचे, जे आले नसतील त्यांची माहिती सांगायची असा क्रम सुरू केला. भिडस्तपणामुळे स्वतःबद्दल कोणी सहसा जास्त बोलत नाही हे पाहून एकेकाने इतरांबद्दल सांगितले आणि त्यातून निसटलेल्या कांही महत्वाच्या आणि मजेदार गोष्टी मी किंवा प्रेक्षकांमधून कोणीतरी मंचावर येऊन सांगितल्या. अशा प्रकारे हा ओळख करून घेण्याचा कार्यक्रम खूप रंगला आणि जवळ जवळ दोन तास चाललेला होता. तो संपत आलेला असतांनाच अचानक वीज गेल्यामुळे प्रोजेक्टर बंद पडला. तोपर्यंत भोजनाची तयारी झाली होती आणि पोटात भुकाही लागल्या होत्या. त्यामुळे इमर्जन्सी लाइट्सच्या उजेडात सारे भोजनालयाकडे रवाना झालो.

भोजनालय शांतीवनातल्याच दुस-या ठिकाणी होते. चांगला मोसम असता तर त्या रम्य परिसरात हिंडत फिरत जायला मजा आली असती. पण वरून कोसळणा-या पावसाच्या धारा, खाली शेवाळ साठून निसरडा झालेला रस्ता, तोसुध्दा अनेक जागी उंच सखल, चढउतार आणि पाय-या वगैरेंने भरलेला, वीज गेल्यामुळे गुडुप काळोख यामुळे हे लहानसे अंतर चालणेसुध्दा जिकीरीचे वाटत होते. कांही लोकांनी दूरदर्शीपणा दाखवून टॉर्च आणले होते, कांही लोकांनी मोबाइलचा उजेड दाखवला. विशेषतः पाय-या असलेल्या जागी कोणी ना कोणी उभे राहून मागून येणा-यांना सावध करत होता. जेवण मात्र छान असल्यामुळे श्रमांचे सार्थक झाले. बहुतेकांच्या आवडीचा कोणता ना कोणता पदार्थ त्यात असल्याने सर्व मंडळी तृप्त होऊन हॉलमध्ये परतली. जास्तच वयोवृध्द लोकांसाठी भोजनाची ताटे भरून त्यांना हॉलमध्ये नेऊन दिली.

कार्यक्रमाची रूपरेषा आखतांना सहा साडेसहाला सुरुवात करायची आणि तासाभरात ओळखीचा भाग संपल्यावर भोजनापूर्वी पुष्कळ वेळ शिल्लक असेल त्यात आपल्या कुटुंबाचा इतिहास थोडक्यात सादर करायचा असा विचार केला होता. गेल्या शंभर वर्षांचा त्रोटक आढावा घेतांना त्यातील प्रत्येक दशकातली जागतिक आणि देशामधली परिस्थिती आणि घटना यांच्या बरोबरीने त्या काळखंडात घडलेल्या आपल्या कुटुंबातल्या महत्वाच्या घटना सांगत जाणारा एक माहितीपट मी तयार केला होता. तो ऐकायला कदाचित रुक्ष वाटेल म्हणून त्यातील महत्वाच्या टप्प्यांवर त्या काळात लोकप्रिय असलेले एक गाणे टाकून लोकांचे थोडे मनोरंजन करायची कल्पना होती आणि त्यासाठी बरीच माहिती जमवली होती. चांगल्या आवाजाची देणगी लाभलेल्या मुलांमुलींमध्ये ही गाणी वाटायची, त्यांनी ती तयार करून ठेवायची आणि ठरलेल्या स्लॉटमध्ये गायची असा विचार होता. पण इतर अनेक उद्योग आणि अडचणी सांभाळता सांभाळताच वेळ निघून गेल्यामुळे या कार्यक्रमाचे पध्दतशीर नियोजनच करता आले नाही. रिहर्सल करायचा प्रश्नच उद्भवला नाही. हा कार्यक्रम करण्यासाठी ठेवलेला टाइमस्लॉटही मिळाला नाही. ज्यांनी यासाठी थोडी तयारी केली होती तिचा उपयोग भोजनोत्तर कार्यक्रमात केला.

. . . . . . . . . . . . . (क्रमशः)

Sunday, August 01, 2010

कौटुंबिक संमेलन - ३

या कौटुंबिक मेळाव्यासाठी पुण्याजवळील शांतीवनात सर्वजणांनी संध्याकाळी पाच ते सहा पर्यंत पोचायचे अशा सूचना दिल्या होत्या आणि बहुतेक सर्वांनी तसा प्रयत्न केला होता. पण घरातून निघतांना शेवटच्या क्षणी कोणाचा फोन वाजणे, दरवाजा बंद करतांना कांहीतरी लक्षात येणे, जिन्यातून खाली उतरल्यानंतर अचानक काहीतरी आठवणे, लहान मुले असल्यास त्यांना आयत्या वेळी तहान, भूक लागणे किंवा निसर्गाची हाक येणे वगैरे प्रकार होतातच. शिवाय रस्त्यातली गर्दी, पावसामुळे संथगतीने चालणारी रहदारी अशा कारणाने विलंब होत जातो. त्यामुळे स्थानिक संयोजक मंडळी जरी वेळेवर जाऊन पोचली असली तरी सहा वाजेपर्यंत थोडेसेच लोक शांतीवनात येऊन पोचले होते. पण त्यानंतर ते एकामागोमाग एक येत गेले आणि अंधार पडण्यापूर्वी म्हणजे सातच्य़ा आत जवळजवळ सगळे आले आणि स्वच्छतागृहाला भेट देऊन ताजेतवाने झाले. बाहेरगावाहून आलेल्या आणि पावसात भिजलेल्या लोकांनी कपडे बदलले. लहान मुलांच्या आयांनी आधीच गोड दिसणा-या आपल्या मुलांना आकर्षक कपडे घालून छान सजवले. चहाचा घोट घशाखाली गेल्यानंतर सर्वांना तरतरी आली आणि औपचारिक कार्यक्रमासाठी सगळे तय्यार होऊन बसले.

इतर कसलेही कारण नसतांना आपण सगळ्यांनी एकदा निव्वळ एकमेकांना भेटण्यासाठी म्हणून एका ठिकाणी जमायचे आणि एकादा दिवस एकमेकांच्या सहवासात गप्पागोष्टी करण्यात घालवायचा. अशी सुरुवात झाली होती आणि त्यासाठी मुबलक वेळ ठेवला होता. तरीसुध्दा हा कार्यक्रम मनोरंजक आणि संस्मरणीय व्हावा, त्यात सर्वांनी उत्साहाने भाग घ्यावा, सर्वांना मनसोक्त आनंद मिळावा म्हणून त्याची एक रूपरेखा आखायचे ठरवले आणि आमच्यातल्या कांही उत्साही तसेच अनुभवी लोकांनी पुढाकार घेऊन फोनाफोनी केली आणि आपसातच कांही गोष्टी ठरवल्या. एकमेकांची माहिती आणि विविधगुणदर्शन ही दोन मुख्य सूत्रे ठरवून कांमाची वाटणी करून घेतली. त्यातले पहिले काम मी करायचे ठरले आणि पंधरा वीस दिवस आधीपासूनच मी त्यासाठी कामाला लागलो.

फार पूर्वीच माझ्या माहितीनुसार मी एक वंशावळ तयार करून ठेवलेली होती. श्रीरंगनानाने त्याच्याकडली लिस्ट पाठवली. दोन्ही पाहून झाल्यावर गरजेप्रमाणे काही लोकांना फोन करून त्यातले कांही तपशील पडताळून पाहिले आणि नव्या सदस्यांची भर घालून ती वंशावळ अद्ययावत केली. आजोबा आजींपासून नवजात बालकांपर्यंत सुमारे दोनशे लोकांची ही यादी कशी सादर करता येईल याचा विचार करत असतांनाच पॉवर पॉइंटमध्ये ते काम करायची कल्पना श्रीने सुचवली आणि मी ती लगेच उचलली. वरपासून सुरुवात करून एक जोडपे आणि त्यांची अपत्ये एवढीच नांवे एका स्लाइडमध्ये घातली. त्यातली एक एक मुले, त्यांच्या पत्नी किंवा पती आणि त्यांची मुले पुढल्या स्लाइडमध्ये दाखवली. अशा वीस पंचवीस स्लाइड्स तयार केल्या. पॉवर पॉइंट या दृष्य माध्यमाचा अधिक उपयोग करून घेण्यासाठी स्लाइडमध्ये दाखवलेल्या नांवांच्या पाठोपाठ त्यांची छायाचित्रे दाखवायचे ठरवले. त्यासाठी माझ्याकडे असलेले सारे आल्बम काढून त्यातले फोटो निवडले. अनेक जणांनी आपापल्या कुटुंबांचे फोटो मेलने पाठवले. चैतन्य आणि उत्कर्ष आपटे कुटुंबाचा आल्बम घेऊन माझ्याकडे आले. माझ्या जन्मापूर्वी काढलेला माझ्या आजीआजोबांचा एक ऐतिहासिक फोटो मिळाला. माझ्या लहानपणच्या आमच्या घरात असलेला ऐतिहासिक आल्बमच बार्शीहून आला. त्यातली लहान लहान बालके आता आजोबा किंवा आजी झाल्या आहेत. त्यातल्या फोटोंचे संकलन करून एक अमूल्य असा ठेवाच मिळाला. आजोबा आजी आणि आईवडील ज्या खेडेगावांमध्ये रहात होते त्या गावाचे स्थान दाखवण्यासाठी गूगलअर्थवरून नकाशा काढला आणि त्यात खुणा करून कोण कोण कुठे रहात होते किंवा आता राहतात ती गावे दाखवली. हे सगळे काम करतांना जी मजा आली तिचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे.

पॉवर पॉइंटवर तयार केलेले हे प्रेझेंटेशन दाखवायची सोय कशी करायची हे पहायचे काम उदयला दिले. शिवाय शंभर लोकांना ऐकू येईल एवढ्या मोठ्याने बोलणे सर्वांना शक्य नसते. त्यासाठी ध्वनिसंवर्धक, ध्वनिप्रक्षेपक असली उपकरणे (माइक, स्पीकर वगैरे) हवीतच. त्यांची सोय शांतीवनाच्या हॉलमध्ये असल्याचे समजले. पण तिथे प्रोजेक्टरची सोय मात्र नव्हती. ती करणे आवश्यक होते. असा प्रक्षेपक कोणाच्याही घरी नव्हताच आणि या व्यवसायात कोणीच नसल्यामुळे माझ्या काँप्यूटरशी सख्य साधू शकेल असा प्रोजंक्टर शोधून काढून तो भाड्याने आणणे हे एक जास्तीचे काम होऊन बसले. सोयीच्या दृष्टीने शांतीवनात घेऊन जाण्यासाठी मी आपला लॅपटॉप पुण्याला नेला आणि त्याच्याबरोबर कम्पॅटिबल असा प्रोजेकेटर निवडून त्याची ट्रायल घेतली. तोपर्यंत तिकडे जाण्यासाठी निघण्याची वेळ झालीच होती. त्यातून आयत्या वेळी गोंधळ झालाच तर वेळ निभावून नेण्यासाठी पुरेसे प्रिंटआउट काढून नेले होते. त्यात चित्रे आली नसली तरी सुवाच्य अक्षरात नामावली तरी दिसली असती आणि सर्वांना वाचता आली असती.

इतर लोकांनीसुध्दा आपापल्या परीने पुरेपूर तयारी केली होती. गायन वादनात प्रवीण असणारे कलाकार आपापली वाद्ये घेऊन आले. तबले, डग्गे, हार्मोनियम वगैरे आलेच, ढोलक, कोंगो बोंगो, कीबोर्ड आणि गिटार वगैरे सर्व वाद्यांनी सुसज्ज असा वाद्यवृंद तयार झाला. मंचावर त्याची मांडणी करणे, त्यांना वीजपुरवठा जोडणे वगैरे तयारी पाहून आता इथे काहीतरी घडणार आहे हे सर्वांना समजले आणि ते सज्ज होऊन पुढे येऊन बसले.

. . . . . . . . . . . . . . (क्रमशः)