Sunday, September 27, 2015

"गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या


http://lalbaugkaraja.com/wp-content/uploads/2014/09/Lalbaugcha-Raja-Visarjan-20141.jpg
मी नोकरीसाठी मुंबईला आलो तेंव्हा मित्रांसोबत दादरला रहात होतो. आम्ही सर्वजणच त्या भागतल्या सर्व सार्वजनिक गणेत्सवांमध्ये रोजच अतीशय उत्साहाने प्रेक्षक म्हणून सहभागी होत होतो.  अनंत चतुर्दशीला तर तासन् तास रस्त्यांवरून भटकत राहून दिसतील तेवढ्या खाजगी आणि सार्वजनिक गणपतींच्या मिरवणुका आणि मूर्ती, सजावट वगैरे पहात होतो. लग्न करून आधी चेंबूर आणि नंतर अणुशक्तीनगरला रहायला गेल्यावर कित्येक वर्षे या दिवशी बसने शहरात जाऊन शक्य तो दुमजली बसच्या वरच्या भागात बसून दिसतील तेवढ्या मिरवणुका आणि प्रतिमा पाहून त्यांना आपल्या डोळ्याात साठवून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. पुढे वयोमानानुसार तेअवघड होत गेले.  टीव्ही वरील अनेक वाहिन्यांमधून त्यांचे दिवसभर प्रक्षेपण होऊ लागल्यानंतर तेच पहायला लागलो.

मी संसार थाटल्यानंतर दरवर्षी आमच्या घरीच पाच दिवसाचा गणेशोत्सव साजरा करायला लागलो. एकदा नाइलाजाने तो तीन दिवसांचाच करावा लागला तेवढा अपवाद वगळला तर दर वर्षी अधिकाधिक उत्साहाने ते करत गेलो. माझ्या दोन्ही मुलांनीही वेगळ्या ठिकाणी संसार मांडल्यानंतर आपापल्या घरी हे उत्सव सुरू केले आणि ते इंग्लंड किंवा अमेरिकेत असतांनाही सुरू ठेवले. एकदा आम्हीही या वेळी पुण्याला गेलेलो असल्यामुळे तिथल्या घरातल्या उत्सवात तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने सहभाग घेतला होता.

या वर्षी प्रकृतीअस्वास्थ्यामुळे आम्ही वाशीच्या घरी घरापुरता उत्सव साधेपणाने साजरा करायचे ठरवले होते. आयत्या वेळी आम्ही दोघेही आजारी पडलो आणि मुलाला पुण्याहून बोलावून घेतले. ते दोघे लगेच आलेच आणि एक दिवस पुण्याला जाऊन त्यांच्या मुलींनाही घेऊन आले. गणेशचतुर्थीच्या आधी माझी पत्नीही हॉस्पिटलमधून घरी आली आणि आम्ही उत्साहाने गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. पण दुस-याच दिवशी मलाच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावे लागले आणि मला कळायला लागल्यापासून या वर्षी प्रथमच मी या उत्सवापासून दूर राहिलो. घरातल्या गणेशाला निरोपसुद्धा देऊ शकलो नाही, याची मनाला चुटपुट लागून राहिली.

आज अनंतचतुर्दशीला मी कुठेच बाहेर जाऊ शकत नव्हतो. गावोगावी होत असलेल्या ठिकठिकाणच्या विसर्जनाच्या मिरवणुका आणि दृष्ये  घरी टीव्हीसमोर बसून पहात राहिलो. हे कार्यक्रम पहात असतांना अचानक आमच्या जिन्यामधूनच "गणपतीबाप्पा मोरया"चा जल्लोष ऐकू आला आणि दारात जाऊन पाहिले तोपर्यंत आमच्या बिल्डिंगमधल्याच एका भाडेकरूने बसवलेल्या गणेशाच्या मूर्तीला विसर्जमासाठी खाली  नेत असलेले पाहिले. मी लगेच खिडकीशी जाऊन उभा राहिलो. आमच्या खिडकीच्या खालीच एक व्हॅन उभी होती आणि तिच्या मागच्या भागात ही मूर्ती ठेवली जात होती. मला तिचे पूर्ण दर्शन घडले. मी तिला दोन्ही हात जोडून नमस्कार केला, प्रार्थना केली आणि "पुढच्या वर्षी लवकर या" असे म्हणत  या गणेशमूर्तीलाच मनोमन निरोप दिला. "गणपती बाप्पा, आता पुढच्या वर्षी पुन्हा मला पहिल्यासारखाच पूर्ण उत्सव साजरा करायची संधी द्या." अशी मनोमन प्रार्थना केली.



Thursday, September 24, 2015

गणपतीबाप्पांची इच्छा




आपण सगळ्या चांगल्या कामांची सुरुवात गणपतीचे स्मरण करून करतो. श्रीगणेशा हा या ब्लॉगवरचा पहिला भाग होता. पुढे त्या वर्षी मी एका मोठ्या आजारामुळे अंथरुणाला खिळलो होतो आणि हा ब्लॉग कदाचित बंदच पडेल असे वाटत होते.  त्या वर्षीचा गणेशोत्सव आला. घरी बसल्या बसल्या आणि पडल्यापडल्या गणेशाची अनंत रूपे पाहून आपल्या परीने ती वाचकांना दाखवण्याचा प्रयत्न करायचे असे मी ठरवले. गणपतीच्या कृपेनेच मी त्याच्या कोटी कोटी रूपांपैकी काही निवडक रूपे दाखवू शकलो.  'कोटी कोटी रूपे तुझी' ही मालिका मी ओळीने ११ दिवस ११ भागात लिहू शकलो. त्या संपूर्ण कालावधीत माझा संगणक व्यवस्थित चालला, आंतर्जालाशी माझा संपर्क खंड न पडता होत राहिला आणि माझी तब्येत सुधारत गेली, माझा उत्साह आणि आत्मविश्वास वाढत गेला. असे व्हावे ही गणेशाचीच इच्छा आणि लीला असणार.

त्यानंतरच्या काळातसुध्दा मी दरवर्षी माझ्या परीने या ब्लॉगवर गणेशोत्सव साजरा करत राहिलो. 'गणेशोत्सव आणि पर्यावरण' या विषयावर लेखमाला लिहून त्यात दोन्ही बाजूचे मुद्दे मांडले.त्या मालिकेत मी सर्व बाजूने विचार करणारे लेख दिले होते. लोकमान्य टिळकांच्या वेळच्या गणेशोत्सवाची आठवण करून देणारे त्यांचेच लेख दिले. आजच्या काळात होत असलेल्या उत्सवाबद्दल लिहितांना त्यातल्या काही सकारात्मक बाबींकडे लक्ष वेधण्याचा आणि नकारात्मक किंवा वादग्रस्त गोष्टींच्या मागची कारणपरंपरा शोधण्याचा अल्पसा प्रयत्नही केला. गणपतीची स्तोत्रे, कहाण्या, गाणी वगैरेंकडे लक्ष पुरवले, काही जुनी, काही नवी गीते, काही स्तोत्रे, काही स्तोत्रांचे अर्थ वगैरे देण्याचा प्रयत्न केला. गणपतीच्या अनेक नावांची यादी संकलित करून दिली. गणपती आणि चंद्रदेव, स्यमंतकमणी यांच्या कहाण्या सांगितल्या. एका वर्षीच्या  वर्तमानपत्रांमध्ये गणेशोत्सवावर छापून आलेल्या लेखांचा आढावा घेतला. अशा प्रकारे दर वर्षी मी या दिवसात श्रीगणेशासंबंधी काही ना काही लिहीत राहिलो.

या वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या एका अपघातात आम्ही दोघेही जबर जखमी झालो होतो. देवाधिदेवाच्या म्हणजे गणपतीच्या कृपेनेच त्यातून बचावलो. त्या काळात मी सतत त्याचाच धावा करत होतो. माझ्या दोन्ही हातांचे ऑपरेशन करावे लागले होते. अलका त्या अपघातामधून सावरते ना सावरते तोपर्यंत तिची काही जुनी दुखणी पुन्हा उफाळून वर आली तर काही नव्या व्याधी उद्भवल्या. यामुळे आम्ही चिंताग्रस्तच होतो. गोकुळाष्टमीच्या सुमाराला आम्हा दोघांच्या प्रकृती जरा स्थिरावल्या. गणपतीबाप्पाचे स्मरण करून त्याचे आभार मानण्यासाठी या वर्षीचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने निदान घरच्या घरापुरता साजरा करायचा असे आम्ही ठरवले. दरवर्षी आम्ही दोघेही मिळून गणपतीची मूर्ती निवडण्यासाठी जात होतो. या बाबतीत अलका जरा चोखंदळ असल्यामुळे त्या ठिकाणी ठेवलेले सगळे गणपती तासभर निरखून पाहून झाल्यावर आम्ही त्यातून आपल्याला हवी त्या आकाराची, रंगाची आणि मुद्रेमधली मूर्ती निवडत होतो. या वर्षी ते शक्यच नव्हते. मी एकटाच लोटलीकरांच्या केंद्रात गेलो आणि पाच मिनिटात निर्णय घेऊन एका सुबक मूर्तीची ऑर्डर दिली. माझ्या हातांच्या नाजुक अवस्थेमुळे या वर्षी मला फारशी सजावट करता येणार नव्हतीच. टेबलावर एकादा पाट मांडून त्यावर आसन पसरायचे आणि त्यावर या मूर्तीची स्थापना करायची असे मनोमनी ठरवले.

पुढचे दोन तीनच दिवस ठीक गेले आणि अलकाला खोकल्याचा त्रास सुरू झाला. तो इतका वाढत गेला की ११ तारखेला तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागले. त्या आधी झालेली जागरणे आणि पडलेला ताण या गोष्टी मलाही सोसल्या नाहीत आणि संसर्गही झाला असणार. मी घरी आल्या आल्या माझ्या अंगात भरपूर ताप भरला. लगेच मुलाला पुण्याहून बोलावून घेतले आणि ते दोघेही दुस-या दिवशी वाशीला येऊन हजर झाले. पहिल्या दिवशी तर उदय पूर्णवेळ माझ्यासोबत घरीच राहिला आणि शिल्पा एकटीच हॉस्पिटलमध्ये अलकाजवळ गेली. दोन दिवसांनी माझ्या अंगातला ताप उतरल्यानंतर मी त्यांच्यापुढे गणेशोत्सवाचा विषय काढला आणि यंदा तो साधेपणाने घरच्या घरापुरता साजरा करायचा असल्याचे सांगितले. तोपर्यंत गणेशचतुर्थी  जवळ आली होती.  ते दोघेच जाऊन मी ऑर्डर केलेली मूर्ती घेऊन आले. गुरुवारी गणेशचतुर्थी होती त्याच्या आधी मंगळवारी अलकालाही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. आमच्या दोन्ही नाती पुण्याला आजोळी राहिल्या होत्या.  शिल्पा पुण्याला जाऊन त्यांना घेऊन आली. काही वर्षांनंतर पुन्हा आम्ही एकत्र येऊन हा उत्सव साजरा करायचा अशी गणपतीबाप्पाची इच्छा होती. सगळी मंडळी जमल्यावर सर्वांना उत्साह आला. उदयने डेकोरेशनचे थोडे सामान आणले आणि त्या चौघांनी मिळून ब-यापैकी सजावटही करून घेतली.

या वर्षीच्या गणेशचतुर्थीला बाहेरच्या कोणा आप्तेष्ट, शेजारी किंवा मित्रांना बोलावणे शक्यच झाले नव्हते. आम्हीच गणेशाच्या मूर्तीला जिन्यापर्यंत नेऊन वाजत गाजत घरात आणले, दारात येताच त्याचे निरांजने ओवाळून स्वागत केले आणि मखरामध्ये स्थापना केली. आम्ही दोघेही अजून धडधाकट झालेलो नव्हतोच. त्यामुळे आम्ही बसल्या बसल्या सगळा सोहळा पाहिला, पूजाविधीमध्ये किंचित मार्गदर्शन केले आणि आरत्या म्हंटल्या. नैवेद्यासाठी लागणारे तळलेले मोदक आणि पंचखाद्य वगैरे पदार्थ त्या गडबडीतही आदल्या दिवशीच करून ठेवले होते, खव्याचे आणि चॉकलेटचे मोदक दुकानामधून आणले. फळफळावळ आणली आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा गणपतीबाप्पाला व्यवस्थित नैवेद्य दाखवले.

गुरुवारी गणपतीचे आगमन झाल्यानंतर आणखी एक दिवस वाशीला राहून शनिवारी पुण्याला परत जायचा विचार असल्याचे उदयने सांगितले. तोपर्यंत त्यांचा इथला मुक्काम आठवडाभर होत होता.  ते दोघे अचानक इकडे निघून आल्याने त्यांची तिकडली काही कामे अर्धवट राहिली होती, त्याच्या मुलींनी पुण्यातल्या त्यांच्या कॉलनीमधल्या सार्वजनिक उत्सवात भाग घेण्यासाठी नाव नोंदवले होते, गाण्यांची कसून तयारी केली होती. त्यांचा कार्यक्रम शनिवारीच होणार होता आणि त्यांना तो चुकवायचा नव्हता वगैरे कारणे होती आणि आता आमची तबेत आम्ही सांभाळू शकू असे वाटायला लागले होते. त्यामुळे आम्ही त्यांना थांबायला सांगितले नाही.

माझ्या अंगातला ताप उतरला असला तरी अजूनही मला थोड्या हालचाली करताच दम लागत होता. त्यामुळे शुक्रवारी डॉक्टरकडे जाणे आवश्यक होतेच. तिथे ईसीजी काढल्यावर डॉक्टरांना काही शंका आल्या आणि घाबरण्याचे कारण नसले तरी एकदा हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना तो दाखवून येण्याचा सल्ला डिस्पेन्सरीमधल्या डॉक्टरीणबाईंनी दिला.  फक्त ईसीजी दाखवून परत येण्यासाठी आम्ही दोघे हॉस्पिटलमध्ये  गेलो, पण तिथे गेल्यावर तिथल्या डॉक्टरांनी मला अॅडमिटच करून घेतले. आता उदय, शिल्पा वगैरे सगळेजण पुण्याला परत जाऊ शकत नव्हते.  कोणीतरी इथे असणे आवश्यक झाले होते. त्यामुळे उदय इकडे थांबला आणि मुलींना घेऊन शिल्पा शनिवारी पुण्याला गेली. मुलींच्या शाळांना सुट्या असल्यामुळे रविवारी सकाळीच ते लोक वाशीला परत येणार होते आणि मग उदय पुण्याला जाणार होता. पण त्या दिवशी पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झाला. त्याचा जोर इतका वाढला की त्यांना तर पुण्याला थांबावे लागलेच पण आज आईला एकटीला घरी सोडून मला भेटायला तू हॉस्पिटलमध्येसुद्धा येऊ नकोस असे मी उदयला बजावले. पावसाचा जोर रात्रीपर्यंत  कमी झाल्यावर पुण्याला गेलेली मंडळी परत आली.

रविवारी सकाळीच ते लोक इकडे आले असते तर उदय लगेच पुण्याला जाऊन सोमवारी त्याच्या ऑफिसात हजर होणार होता, पण गणपतीबाप्पाला ते मंजूर नसावे. मीही हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झालेलो असल्यामुळे गणपतीचे विसर्जन कोण करेल हा एक प्रश्न होताच. त्यामुळे उदयने त्याचा मुक्काम एका दिवसाने वाढवला. सोमवारी संध्याकाळपर्यंत मलाही डिस्चार्ज मिळणार असल्याचे त्याच दिवशी सकाळी ऐकल्यावर मी विसर्जनाच्या आधी घरी जाऊन पोचू शकेन अशी एक आशा निर्माण झाली होती. पण तिथून निघायच्या आधी मला एका हृदयरोगतज्ज्ञाला दाखवायचे होते. बाहेरून व्हिजिट करायला येणारा तो डॉक्टर केंव्हा भेटेल हे कोणी सांगू शकत नव्हता. गणपतीची उत्तरपूजा आणि विसर्जन करण्यापूर्वी मला घरी घेऊन यायचे म्हणून इतर लोक माझ्यासाठी थांबले असते तर कदाचित विसर्जनाला खूप उशीर झाला असता आणि त्या दिवशी गौरीगणपतींचे एकत्र विसर्जन असल्यामुळे रस्त्यात तसेच तळ्यावर प्रचंड गर्दी झाली असती. यावर बरेच वेळा फोनवर उलटसुलट चर्चा करून झाल्यावर मी उदयलाच विसर्जन करून घ्यायला सांगितले.

हॉस्पिटलमधल्या माझ्या तपासण्या आणि त्यावरील कागदी कारवाया उरकून मला प्रत्यक्ष डिस्चार्ज मिळायला रात्रीचे आठ वाजून गेले.  त्यामुळे आमचा निर्णय तसा बरोबर ठरला. पण मला मात्र चुटपुट लागून राहिली. त्या दिवशी मी गणपतीच्या विसर्जनासाठी तळ्यापर्यंत जाऊ शकलो नसतोच, पण निदान घरातली पूजा बघितली असती, आरती म्हंटली असती. घरात आरत्या चाललेल्या असतांना मी सेलफोनवरून त्या ऐकाव्यात आणि हॉस्पिटलमध्येच मनातल्या मनात म्हणाव्यात असा प्रयत्नही केला.  पण नेमक्या त्याच वेळी मला हॉस्पिटलमधल्या अशा विभागात नेले होते जिथे मोबाईलचा सिग्नलच येत नव्हता. या वर्षी गणपतीबाप्पाला माझ्याकडून एवढी सेवा करून घ्यायची नव्हती अशी त्याचीच इच्छा होती असे म्हणायचे. त्याआधी सकाळच्या वेळी बेडवरच बसून मी अथर्वशीर्षाची आवर्तने मात्र केली होती.

अशा प्रकारे या वर्षीच्या आमच्या घरातल्या गणेशोत्सवात अनपेक्षित घटना घटत गेल्या. त्यांचा क्रम आणि टाइमिंग यांचा विचार केल्यास मन थक्क होते. अखेर आपणा सर्वांचा कर्ता करविता तोच असल्याची खात्री पटावी असा हा अनुभव होता. त्वमेव केवलम् कर्ताSसि, त्वमेव केवलम् धर्ताSसि,  त्वमेव केवलम् हर्ताSसि असे जे म्हणत होतो त्याची प्रचीती येत होती.
   







Tuesday, September 08, 2015

मानवी संबंध (उत्तरार्ध) - प्रेमबंध

आधीचा भाग : मानवी संबंध (पूर्वार्ध) -जुळणे आणि तुटणे
http://anandghan.blogspot.com/2015/08/blog-post_29.html

आपण माणसामाणसांमधल्या संबंधांचा विचार करतो त्यावेळी बहुतेक वेळा तो विचार त्यांच्या आपसातल्या चांगल्या संबंधांबद्दल असतो. जवळच्या किंवा सर्वात आतल्या वर्तुळातल्या लोकांशी सर्वांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि घनिष्ठ संबंध असतात, माणसांमाणसांमधले अंतर जसजसे वाढत जाते तसतशी त्या  संबंधांची वीण सैल होत जाते. थोड्या बाहेरच्या वर्तुळातल्या लोकांशी सर्वांचे सलोख्याचे संबंध असतात आणि दूरच्या इतर लोकांशी कामापुरते वरवरचे संबंध असतात. ज्यांच्याबद्दल मनात वैरभाव किंवा द्वेष असतो त्यांच्याशी सहसा कोणी संबंध ठेवतच नाहीत आणि ठेवलेच तर ते औपचारिक तोंडदेखले खोटे खोटे असतात, म्हणजे खरे तर ते नसल्यातच जमा असतात.  काही वेळा मात्र एका माणसाला दुसरा माणूस जवळचा वाटत असतो पण तो मात्र पहिल्या माणसापासून दूर दूर रहात असतो असे अनुभवसुद्धा येतात. यामुळे त्यांचे परस्परसंबंध गुंतागुंतीचे होतात.  दोन व्यक्तींमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होत असतांना त्यामधून आपुलकीची भावना निर्माण होते. आपुलकी आणि प्रेमाच्या धाग्याने ते लोक एकमेकांशी बांधले जातात, म्हणून त्यांना संबंध असे म्हणायचे. हे बंधन का आणि कसे होत असेल?

परमेश्वराने किंवा निसर्गाने जगातल्या सर्वच प्राणिमात्रांना स्वतःचा जीव वाचवण्याची एक जबरदस्त अंतःप्रेरणा (Instinct) दिलेली आहे. किडामुंगींपासून वाघ, सिंह. हत्ती वगैरेंपर्यंत प्रत्येक जीव स्वसंरक्षणासाठी सदोदित धडपडत असतो. आपल्या जिवाला धोका आहे असे वाटताच तो लपून बसतो, पळून जातो किंवा शत्रूवर प्रतिहल्ला चढवतो. प्रत्येक सजीव प्राण्याच्या शरीराला अन्नाची गरज असते म्हणूनमुळे ते शोधत तो फिरत असतो आणि त्याला विश्रांती व निद्रा यांची गरज असते म्हणून त्यासाठी तो निवारा पाहतो.  या दोन्हींचा समावेशसुद्धा त्या प्राण्याच्या जीव वाचवण्याच्या मूलभूत प्रेरणेबरोबरच करता येईल. या बाबतीत प्रत्येक प्राणी हा मुख्यत्वे स्वार्थीच असतो. सशक्त शाकाहारी प्राणी दुसऱ्या कमजोर प्राण्याच्या समोरचे अन्न बिनदिक्कतपणे खायचा प्रयत्न करतात तर मांसाहारी प्राणी दुसऱ्या प्राण्यांनाच खाऊन टाकतात. निवाऱ्याच्या बाबतीतसुद्धा निसर्गामध्ये बळकावणे चाललेले असते. सगळे नागोबा आयत्या बिळातच घुसून वास्तव्य करतात. तसे पाहता माणूससुद्धा त्याच्या मूळ स्वभावाने स्वार्थीच असतो, संस्काराने त्याच्यात बदल होतात. त्याशिवाय इतरही काही कारणे असतात.

समस्त प्राणीमात्र नेहमी स्वतःचा स्वार्थ पहात असले तरी त्यांना इतर प्राणीमात्रांच्या सोबतीनेही रहायचे असते. कदाचित त्यात त्यांना अधिक सुरक्षित वाटत असेल. म्हणजे हा सुद्धा आपला जीव वाचवण्याचाच एक भाग झाला. तशा प्रकारची दुसरी अंतःप्रेरणाही त्याला मिळत असते. यामुळेच जगातले बहुतेक प्राणी, कीटक, मासे, पक्षी वगैरे जीव कळप करून राहतात. तसे रहात असतांना त्यांना स्वतःच्या स्वार्थाला थोडी मुरड घालणे, थोड्या गोष्टी इतरांसाठी सोडणे, इतरांचा थोडा त्रास सोसणे वगैरे करणे भाग असते. एकाद्याने तसे नाही केले तर कळपातले इतर प्राणी त्याला हुसकावून लावतील अशी भीती असते. बहुतेक सगळी माणसेसुद्धा लहानमोठ्या समूहांमध्ये राहणेच पसंत करतात. आपले कुटुंब, वस्ती, गाव, प्रदेश, देश, जग  किंवा कुटुंब, पोटजात, जात, धर्म अशा चढत्या भाजणीने त्यांच्या समूहाच्या व्याख्या बदलत जातात एवढेच. त्याचे वागण्याचे नियम त्यानुसार ठरत जातात आणि ते पाळण्याची गरज त्यांना वाटते. ते करत असतांना स्वार्थाला बाजूला ठेवावे लागतेच.

पण या सगळ्यांच्या पलीकडे जाणारी आणखी एक दिव्य अशी अंतःप्रेरणा माणसाला तसेच इतर जीवांना मिळत असते.  प्रत्येक प्राणी किंवा पक्षी आपल्या पिलांवर माया करतात, त्यांचे जिवापाड संरक्षण करतात, त्यांच्यासाठी अन्नाची तरतूद करतात. यात त्यांचा कसलाही स्वार्थ नसतो किंवा हा परस्पर सहकाराचा भागही नसतो. यात शुद्ध आपुलकी आणि प्रेम असते. पक्षी जोडप्याने रहात असतात, त्यांनाही आपल्या जोडीदाराविषयीसुद्धा विशेष असे काही वाटत असणार. एका कळपातल्या प्राण्यांमध्ये एक प्रकारची जवळीक निर्माण होत असते. पाळीव प्राणी नेहमीच त्यांना पाळणाऱ्यांशी मायेच्या नात्याने जोडले जातात.  हे मुके जीव त्यांच्या डोळ्यांमधून किंवा अंगलटीला येऊन प्रेम व्यक्त करतात. कुत्रा हा प्राणी तर अत्यंत इमानदार समजला जातो. त्यांचे हे वागणे हे नैसर्गिक स्वार्थभावनेच्या विरुद्ध असले तरी होत असते. ते कशामुळे होत असेल ?

सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचा पगडा सर्व माणसांच्या आचार आणि विचारांवर असतो आणि त्यानुसार ती वागत असतात असे आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये लिहिले आहे सांगितले जाते. प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत या तीन गुणांचे प्रमाण मात्र निरनिराळे असते. दुसऱ्याकडील वस्तू हिसकावून किंवा लुबाडून घेणे, तिचा विध्वंस करणे ही राक्षसी वृत्ती माणसातल्या तम या वाईट गुणाच्या प्रभावामुळे येते. आपल्याला हवे असेल ते आपल्या प्रयत्नाने आणि परिश्रमाने मिळवण्याची धडपड सर्वसाधारण माणसे करत असतात. ही मानवी वृत्तीची क्रिया त्यांच्यातल्या रज या गुणामुळे त्यांच्याकडून घडत असते. काही दुर्मिळ लोक स्वतः उपाशी राहून आपला घास भुकेल्यांना भरवतात, इतरांचा फायदा व्हावा यासाठी स्वतः तोशीस सोसतात. इतरांना सुखी करण्यात स्वतःचा आनंद शोधतात. अशा लोकांची गणना देवमाणूस म्हणून केले जाते. परोपकार, दया, माया, भक्ती, सचोटी, कृतज्ञता वगैरे दैवी गुण माणसातल्या सत्त्वगुणामधून येतात. प्रेमाची भावना हे सत्त्वगुणाचे सर्वात सुंदर असे रूप आहे.  प्रेमळ लोक सात्त्विक प्रवृत्तीचे असतात किंवा सात्त्विक लोक प्रेमळ असतात असे आपण पाहतोच. प्रत्येक माणसाच्या अंगात काही प्रमाणात सत्त्वगुण असतात आणि जे कोणी लोक त्याला आपलेसे वाटत असतात त्यांच्यासंबंधी त्यालासुद्धा प्रेम, माया, ममता वगैरे वाटत असते, तो त्यांची काळजी करतो आणि घेत असतो.

प्रेम ही भावना बांधून ठेवणारी असते. त्याने माणसे एकमेकांशी जोडली जातात आणि राहतात. माणसांना जन्मतःच आईचे प्रेम मिळते आणि ते मिळत राहते. वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा, काका, काकू वगैरे घरातील इतर व्यक्तींचा लळा त्यांना सहवासातून लागत जातो. त्यात हळूहळू इतर नातेवाईक, शेजारी, शिक्षक वगैरेंची भर पडत जाते. पुढे त्यांचा स्वतःचा मित्रपरिवार निर्माण होतो आणि तो वाढत जातो. तरुण वयात ते आपल्या जोडीदाराची निवड करतात. नैसर्गिक आकर्षणामुळे त्यांच्या एकमेकांवर वसलेल्या प्रेमाचे धागे खूप घट्ट होतात. ते बंध त्यांना इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्वाचे वाटायला लागतात. अगाध मित्रप्रेमाविषयी खूप लिहिले गेले आहे. देश, धर्म यांच्याविषयी वाटणाऱ्या प्रेमासाठी कित्येक भक्तांनी बलिदान केलेले आहे. देवभक्तीमध्ये लीन झालेल्या व्यक्तीला इतर कशाचेच भान रहात नाही. इतकेच काय पण लेखक, कवी, गायक, नटनट्या यांच्यावरील एकतर्फी प्रेमापोटी माणसे वेडी होतात. आवडत्या नेत्याचे अनुयायी आपले तनमनधन त्याला अर्पण करतात.

या सगळ्याच्या मागे असलेले प्रेमबंध हे समान कारण असते.  ज्या व्यक्ती, संस्था किंवा समाज यांच्याविषयी आपल्याला आपुलकी वाटत असते, त्याच्या संबंधातले सगळे काही जाणून घ्यायला, ऐकायला, बोलायला आपल्याला आवडते, त्याला काही होणार तर नाही ना किंवा कसे होणार याची चिंता वाटते आणि काही बिनसले तर दुःख होते, त्याला यश मिळाले तर आनंद होतो. कारण आपण त्याच्याशी जोडले गेलेले असतो. ग्वाटेमालात एकादा अपघात झाला किंवा सोमालियात  दंगल झाली आणि त्यात जीवित वित्त यांची हानी झाली असे आपण बातम्यांमध्ये वाचले किंवा ऐकले तर क्षणभर हळहळ वाटेल, पण तसे काही पुण्यामुंबईला घडले तर आपण बेचैन होऊन जातो कारण ज्यांच्याबद्दल आपल्याला प्रेम वाटते अशा अनेक व्यक्ती तिथे रहात असतात किंवा काही कारणाने तिथे गेलेल्या असतात, आपल्याला त्यांची काळजी वाटते,  तिथल्या काही जागांना आपल्या भावविश्वात स्थान असते, त्या ठिकाणच्या नेमक्या परिस्थितीची माहिती मिळवण्यासाठी आपण धडपड करतो. या सर्वांशी आपण बांधले गेलेलो असल्यामुळे तिथे काय घडले याचा आपल्यावर परिणाम होतो.

या विषयावर असंख्य लोकांनी अगणित वेळा अमाप लिहिले असले तरी पुन्हा त्यालर लिहावे वाटते कारण या विषयाबद्दल आपल्याला आणि वाचकांना वाटणारा जिव्हाळा आणि प्रेमबंध.