Saturday, March 31, 2012

स.दा.रडके आणि सदानंद

सदाशिव दामोदर रडके त्याच्या नावाला स्मरून सतत दुर्मुखलेलाच असायचा. सगळे जग चुकीच्या किंवा वाईट गोष्टींनी भरले आहे, त्यात रहाण्याच्या लायकीचेच ते नाही असे त्याचे मत होते. त्याबद्दल इतर माणसे तक्रार का करत नाहीत ही त्याची सर्वात मोठी तक्रार असे. सगळे लोक त्याच्या वाईटावर टपून बसले आहेत असेही त्याला कधी कधी वाटत असे. त्याचे रडगाणे ऐकून कंटाळलेल्या एका माणसाने त्याला सांगितले की जवळच सदानंद नावाचा नेहमी आनंदात राहणारा एक सुखी माणूस राहतो. सदाशिवाचा त्यावर विश्वासच बसेना. तेंव्हा तो माणूस त्याला सदानंदाकडे घेऊनच गेला. सदाशिवाची लहान मुलगीसुध्दा हट्ट धरून त्याच्या मागे मागे तिथे गेली.


सदानंदाने त्यांचे स्वागत करून त्यांना दारातून आत यायला सांगितले. त्याचे एका खोलीचे घर पाहून सदानंद उद्गारला, "आत येऊन काय करू? तुमच्या डोक्यावर बसू?"

सदानंदाने शांतपणे दोन घडीच्या खुर्च्या उघडून पुढे केल्या. कुरकुरतच सदाशिव एका खुर्चीवर बसत बोलला, "तुम्ही खूप सुखी आहात असे ऐकले होते, तुम्हाला काही प्रॉब्लेमच नाहीत का हो?"

सदानंदाने उत्तर दिले, "अहो. तुम्ही आज माझ्याकडे पहिल्यांदाच आला आहात. आधी तुम्ही कोण ते सांगा. माझ्याबद्दल आपण नंतर बोलू."

"माझे नाव स दा रडके"

"तुम्ही कुठून आला आहात?"

"जवळच माझा बंगला आहे, पण कोणी त्याच्याकडे लक्षच देत नाही हो. सगळा घाणेरडा झाला आहे. पहावे तिथे धूळ, डाग आणि भेगा दिसतात."

"तुमच्या घरी आणखी कोण कोण असतात?"

"आई, बाप, बहीण, भाऊ, बायको, मुले वगैरे भरपूर लोक आहेत, पण कोणी माझे ऐकतच नाहीत. सारखी कटकट करत असतात."

"घराबाहेर तुमचे कोण मित्र वगैरे असतीलच."

"छे! इथले सगळे लोक इथून तिथून आप्पलपोटे आणि बिलंदर आहेत. शिवाय वर मलाच फिदीफिदी हसत असतात. इथे कोणाबरोबर संबंध ठेवायची मुळी कुणाची लायकीच नाही."

"परगावी तुमचे कोणी आप्त असतील. "

"हट्! पुण्याची माणसं भारी खंवचट, कोल्हापूरची ठसकेबाज आणि नागपूरची तर नेहमी आपलाच बडेजाव सांगणारी. त्यांच्याशी कोण संबंध ठेवेल?"

"बरं, आज माझ्याकडे कशासाठी आला आहात?"

"तुम्ही खूप मजेत राहता, नेहमी चांगल्या मूडमध्ये असता असं यांनी सांगितलं म्हणून तुम्हाला भेटायला यांनीच मला इथं आणलं आहे. पण इथं तर एवढ्याशा टीचभर जागेत इतकी अडगळ आहे, शिवाय सगळीकडे धूळ, डाग आणि भेगा. मला तर हे पहावतसुध्दा नाही. तुम्ही कसं काय इथं सुखाने राहू शकता हो?"

"ते माझं सिक्रेट आहे. एरवी मी कधी कुणाला सांगत नाही, पण तुम्हाला ऐकायचे असेल तर मी सांगेन, पण त्यासाठी आधी दोन मिनिटे तुम्हाला मी सांगेन ते करावे लागेल. घाबरू नका, तुम्हाला काहीही कष्ट पडणार नाहीत."

"सांगा."

"तुम्हाला माझं घर पहावत नाही ना? आपले डोळे मिटून घ्या आणि मी सांगतो ते मंत्र पाच पाच वेळा म्हणा."

"श्रीगणेशायनमः"

"श्रीग्णेशैन्म्ह"

"असे घाई घाईने म्हंटलेत तर ते त्या देवाला समजणार नाहीत, जरा सावकाश म्हणा श्री ग णे शा य न मः"

त्यानंतर ॐ नमःशिवाय, ॐ नमो भगवते वासुदेवाय वगैरे आणखी काही देवांचे मंत्र त्याने सदाशिवाकडून पाच पाच वेळा म्हणवून घेतले. तोपर्यंत त्याच्या डोळ्यावरचा चष्मा हलकेच काढला, त्यावर बसलेली धूळ, पडलेले डाग, रेघोट्या वगैरे पुसून तो स्वच्छ केला. तो त्याच्या डोळ्यावर पुन्हा चढवून खोलीतला दिवा मालवला आणि म्हंटले, "आता डोळे उघडलेत तरी चालेल."

"हे काय? सगळीकडे अंधार पसरला आहे."

"तुमच्या मनावरचं माझ्या खोलीचं तुम्हाला न आवडलेलं चित्र मी पुसून टाकलं आहे. आता मी दाखवतो ते पहा आणि लक्षात ठेवा."

असे म्हणून त्याने हातातल्या बॅटरीचा झोत एका मूर्तीवर टाकत विचारले, "कृष्णाची ही मूर्ती किती सुरेख आहे ना?"

"असेल, मग मी काय करू?"

"छान दिसते तरी आहे ना?"

"हो."

हातातल्या बॅटरीचा झोत भिंतीवर टांगलेल्या एका चित्रावर टाकून विचारले, "हा समुद्रकिना-याचा देखावा किती हुबेहूब काढला आहे ना?"

"असेल, पण आपल्याला त्याचा काय उपयोग आहे? त्या चित्रातल्या वा-यानं इथला उकाडा कमी होणार आहे का?"

"नाही, पण या चित्राकडे पहाणे तर चांगले वाटते तर आहे ना?"

बॅटरीचा झोत तिथे आलेल्या लहान मुलीच्या तोंडावर टाकून विचारले, "किती गोड मुलगी आहे ना? तुझीच आहे ही." असे म्हणत त्या मुलीला खुणेनेच सदाशिवाकडे पाठवले. त्यानेही तिला जवळ घेतले. घरातला दिवा लावून सदानंदाने सांगितले, "आता तुम्हाला दाखवलेल्या तीन्ही सुंदर गोष्टी या इथेच होत्या, पण मघाशी तुमचं लक्ष त्यांच्याकडे गेलं नाही. तुम्हाला माझ्या घरातच नाही तर सगळीकडेच धूळ, डाग आणि भेगा दिसत होत्या, कारण त्या तुमच्या चष्म्याच्या काचेवर होत्या. इथे असलेले पेन, कागद, पुस्तके, कात्री, सुईदोरा, स्क्रू ड्रायव्हर, कुंचा, झाडू वगैरेसारख्या तुम्हाला अडगळ वाटणा-या या सगळ्या गोष्टी माझ्या उपयोगाच्या वस्तू आहेत. मुद्दामच मी त्या सगळ्या आपल्या नजरेला येता जाता सहज दिसतील अशा ठेवल्या आहेत. ज्या वेळी ज्या गोष्टीची मला गरज पडते तेंव्हा ती मला लगेच मिळते, तिला शोधावे लागत नाही की बाहेर जाऊन ती आणावी लागत नाही. सुंदर मूर्ती किंवा फ्रेम वगैरेंकडे पाहतांना मला आनंद मिळतो, त्यांचा मला किती उपयोग होतो याचा विचार मी करत नाही, त्याचप्रमाणे उपयुक्त वस्तूंमुळे माझी कामे लवकर होतात, त्यांच्याविना ती खोळंबून रहात नाहीत, यातूनही मला वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. त्या वस्तू दिसायला सुंदर असण्याची गरज नाही, त्या लगेच हाती येणे महत्वाचे असते. ज्याचा मला काही उपयोगही नाही आणि जो चांगला दिसतही नाही असा कचरा मी केराच्या टोपलीत टाकून देतो. नंतर मला त्याचा त्रास होत नाही.


माणसांच्या बाबतीतसुध्दा असंच असतं. काही काही माणसं खूप हुषार, जाणकार, विनोदी, अनुभवी, देखणी, प्रेमळ वगैरे असतात, त्यांच्या सहवासात आपल्याला आनंद मिळतो. आपल्या कामाच्या बाबतीत त्यांचा आपल्याला उपयोग होईलच असे नाही. तर अनेक माणसांकडे कुठलेही विशेष गुण नसले तरी ती आपल्या कामाची असतात. त्यांची आपल्याला खूप मदत होते. या सर्वांकडून आपल्याला आनंद मिळत असतो. वस्तू आणि माणूस यात एक फरक मात्र असतो. वस्तू आपण होऊन काही करत नाहीत. आपण त्यांचा उपयोग आपल्याला हवा तसा करून घेतो. माणसं मात्र दुस-याला आनंद किंवा मदत देऊ शकतात तसेच त्रासही देऊ शकतात. एवढे लक्षात ठेवले की आपल्याला काय करायचे ते ठरवता येते. ज्याच्याकडून जेवढा आनंद, सहकार्य, मदत वगैरे मिळेल तेवढे घ्यावे. त्याच्या इतर बाबतीतील उणीवांकडे जास्त लक्ष देऊ नये, आवश्यक वाटल्यास त्यापासून सावध रहावे एवढेच करायचा मी प्रयत्न करतो. त्यामुळे मला माझ्या सभोवतालचे जग वाईट आहे असे वाटत नाही. या जगातल्या आपल्याला आवडतील त्या आणि उपयोगाच्या वस्तू शोधाव्यात, त्या आणून ठेवून घ्याव्यात, न आवडणा-या सोडून द्याव्यात. त्याचप्रमाणे आपल्याला आवडणारी, प्रेम आणि मदत करणारी माणसे जोडावीत, कोणाबरोबर गहन विषयावर चर्चा करावी, कोणाशी थट्टामस्करी करावी, कोणाचे मजेदार अनुभव ऐकून घ्यावेत, कोणाकडून मनोरंजक माहिती घ्यावी. कोणाचे गाणे ऐकावे, कोणाचा अभिनय पहावा अशा असंख्य प्रकारे आपल्याला इतर लोकांकडून आनंद मिळत असतो. त्याचप्रमाणे आपल्या कामात असंख्य लोकांचे सहकार्य किंवा मदत आपल्याला मिळत असते. ती करणे हे त्यांचे कामच आहे, त्याची त्यांनाही गरज आहे किंवा त्यापासून त्यांचाही फायदा होतो वगैरे विचार करण्यापेक्षा आपल्याला लाभ झाला आहे याकडे लक्ष दिले तर त्यापासून समाधान मिळेल. माणसांचे आपसातले संबंध परस्परावर अवलंबून असतात. त्यामुळे समोरच्या माणसाने आपल्याला कसे वागवावे असे आपल्याला वाटते तसे आपण त्याच्याशी वागलो, तर तोही आपणास तशी वागणूक देण्याची शक्यता असते. दुस-यांकडून मदतीची अपेक्षा करायची असल्यास जे जे आपण त्यांच्यासाठी करू शकतो ते करत रहावे. ज्यांच्याशी पटत नसेल त्यांच्यापासून दूर रहावे. आपली दृष्टी स्वच्छ ठेवली, त्यावर धूळ बसू दिली नाही, डाग, चरे पडू दिले नाहीत तर आपल्याला ते सगळीकडे आणि सारखे दिसत राहणार नाहीत. एवढे केले तर या जगात आनंदी रहाणे शक्य आहे."



Saturday, March 24, 2012

घई आणि घाई

थोडे दिवस पुण्याला राहून परत आल्यानंतर आपल्या घरातला मेलबॉक्स उघडून पाहिला. आप्तांनी किंवा मित्रांनी स्वतःच्या अक्षरात लिहिलेली पत्रे आजकाल येतच नाहीत. मी तरी यापूर्वी कधी आणि कोणाला व्यक्तीगत पत्र लिहिले होते हे आठवतसुध्दा नाही. हा रिवाजच आता नाहीसा होत चालला आहे. निरनिराळी बिले, वार्षिक अहवाल, नोटिसा, जाहिराती, कार्यक्रमांची किंवा समारंभांची आमंत्रणे वगैरे छापील पत्रकांनीच तो डबा भरला होता. त्यातच पोस्टकार्डाच्याही अर्ध्या आकाराचे एक चिटोरे होते. ते एका कूरियर कंपनीकडून आले होते. "तुमच्यासाठी आलेले पत्र आमच्या कंपनीच्या ऑफीसामधून ताबडतोब घेऊन जावे." अशा अर्थाच्या छापील मजकुरात पाठवणा-याचे नाव 'पी.एस.घई' आणि असिस्टंटचे नाव 'संतोष' एवढे दोनच शब्द गिचमिड अक्षरात हाताने लिहिले होते.
हा घई कोण असावा? यावर माझे विचारचक्र सुरू झाले. 'सुभाष घई' हे एकच सुप्रसिध्द नाव माझ्या परिचयाचे होते, म्हणजे फक्त ते नावच तेवढे मला माहीत आहे, तेसुध्दा हे गृहस्थ सिनेमे काढतात म्हणून! "आम्ही मायबाप प्रेक्षकांसाठी चित्रपट काढण्याचे उपद्व्याप करतो." वगैरे थापा हे सिनेमावाले मारत असले तरी त्यांचे सिनेमे पहायला कोण लोक येतात त्याची चौकशी ते कधीच करत नाहीत. सिनेमाचे तिकीट काढतांना कधीही मी आपले नावगाव सांगितल्याचे मला तरी आठवत नाही. तो पाहून झाल्यावर त्यातला कोणता भाग मला बरा वाटला आणि कोणता भाग भिकार याची चर्चा मी कोणाबरोबर केलीही असली तरी साक्षात सुभाष घईलाच पत्र लिहून ते कळवण्याची तसदी मी कधी घेतली नव्हती की त्यावर कोठल्याही माध्यमातून माझी जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. त्यामुळे माझे नावसुध्दा त्याच्या कानावर जाण्याची मुळीच शक्यता नव्हती. अभिनय, गायन, गीतलेखन, संवादलेखन, छायाचित्रण, संकलन असल्या सिनेमाक्षेत्राशी संबंधित कुठल्याच क्षेत्राशी माझा दूरान्वयानेही संबंध नसल्यामुळे सुभाष घईने माझा पत्ता शोधून काढला नसणारच. थोडक्यात म्हणजे त्याच्या नावामागे कदाचित एकादा 'सायलंट पी' असला अशी कल्पना केली तरीही त्या (पीएस)घईने मला पत्र पाठवले असण्याचे एकही कारण दिसत नव्हते.

सुभाष घईचे नाव अशा प्रकारे रद्द करेपर्यंत घई या नावाची दुसरी एक व्यक्ती मला आठवली. माझ्या ऑफीसात घई नावाचे कोणी नवे फायनॅन्स डायरेक्टर असल्याचे मी कोणाकडून तरी ऐकले होते. मी सेवानिवृत्त झाल्यानंतर ते आपल्या पदावर रुजू झालेले असल्यामुळे मी त्यांना प्रत्यक्षात कधी भेटलेलो नव्हतो, पण त्या महत्वाच्या जागेवर ते आले असल्याची माहिती माझ्यापर्यंत पोचली होती. त्यामुळे हे कूरियर त्यांनीच पाठवले असावे असे मी ठरवून टाकले. त्यांना तरी ते पाठवायची काय गरज पडली असेल? या प्रश्नाची काही संभाव्य उत्तरेही मिळाली. सरकारी कर्मचा-यांचे वेतन ठरवण्यासाठी आयोग नेमले जातात. दीर्घकाळानंतर ते आपला अहवाल देतात. सरकार तसेच कर्मचा-यांची संघटना या दोघांनाही ते पसंत पडत नाहीत. त्यामुळे ते त्यावर थेट चर्चा आणि घासाघीस करून नव्या वेतनश्रेण्या ठरवतात. त्यासंबंधी काढलेल्या सरकारी फतव्यांमध्ये कधीकधी अनेक त्रुटी किंवा असंबध्दपणा आढळतो. त्यावर वादविवाद, कोर्टकचे-यातले तंटे, लवाद वगैरे चालत राहतात. त्यांच्या निकालानुसार नवी पत्रके निघतात. हे सगळे पुढील आयोग बसेपर्यंत चालतच असते. अशाच कुठल्याशा उपकलमात बदल युचवणा-या पत्रकानुसार मला काही फायदा होणार असल्याचे फायनॅन्स डिपार्टमेंमधल्या कोणाच्या लक्षात आले असेल आणि त्याने त्या लाभाच्या थकबाकीचा धनादेश माझ्याकडे पाठवला असेल असे मनातले मांडे मी खाऊन घेतले.

पण अशा प्रकारचा पत्रव्यवहार एकदम डायरेक्टरच्या पातळीवर करायची काय गरज होती? एरवी एकाद्या अकौंट्स ऑफीसर किंवा मॅनेजरनेच हे काम केले असते. कदाचित उच्च पदावरून निवृत्त झालेल्या लोकांचा मान राखण्यासाठी त्यांना स्वतः पत्र पाठवण्याचा नवा पायंडा या घईने सुरू केला की काय? असा विचित्र विचार मनात आला. कदाचित हे पत्र मला वाटत होते त्या संबंधात नसेलच. हे घई महाशय ऑफीसातल्या एकाद्या समीतीचे अध्यक्ष असतील आणि त्या भूमिकेतून त्यांनी मला व्याख्यान देण्यासाठी किंवा उद्घाटन करण्यासाठी, किंवा नुसतीच हजर राहून शोभा वाढवण्यासाठी पत्र पाठवून पाचारण केले असण्याचीही शक्यता होती. काही का असेना, या निमित्याने त्या ठिकाणी जाण्यासाठी मी उत्सुकच होतो. त्यामुळे न मिळालेले हे पत्र वाचण्याची उत्कंठा मला अनावर झाली.

सकाळी कूरियरचे ऑफीस उघडायच्या वेळीच तिथे जाऊन धडकलो. पण तिथे निराशाच पदरी पडली. दोन दिवस माझी वाट पाहून ते पत्र परत पाठवले असल्याचे तिथल्या माणसाने सांगितले. म्हणजे त्याने ते नेमके कोणाकडे आणि कुठल्या पत्यावर परत पाठवले हे विचारायचे भानही मला निराशेच्या भरात त्यावेळी राहिले नाही. मी विचारणा केली असती तरी त्याचे उत्तर मिळण्याची शक्यता तशी कमीच होती, कारण ते एक लहानसे एक्स्टेंशन होते. कंपनीच्या मुख्य ऑफीसमधून तिथे आलेली पत्रे घरोघरी जाऊन वाटायची आणि ग्राहकांनी पाठवण्यासाठी आणून दिलेली पत्रे हेडऑफीसकडे पाठवून द्यायची एवढेच काम करणा-या त्या माणसाकडे सर्व पत्रांचे सविस्तर रेकॉर्ड असण्याची संभावना कमीच होती. पण ते पहाण्याचा प्रयत्न करणेही मला त्या क्षणी सुचले नाही.

मी तडक माझ्या जुन्या ऑफीसाकडे गेलो. सिक्यूरिटी ऑफीसमध्ये एक अनोळखी नवा चेहरा दिसला. त्याने मला ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. माझे काय काम आहे हे मी सांगितल्यावर त्याने डिस्पॅच सेक्शनशी फोन जोडून दिला. तिथे एक जुन्या बाई अद्याप कामावर होत्या. माझे नाव ऐकताच त्यांना माझी ओळख पटली आणि तत्परतेने मला लागेल ती मदत करायला त्या सज्ज झाल्या. पण 'घई' हे नाव ऐकताच त्या उद्गारल्या, "घई साहेबांची तर सहा महिन्यांपूर्वीच बदली झाली." मग त्यांनी मला आठ दहा दिवसांपूर्वी पत्र पाठवणे कसे शक्य आहे? संतोष नावाचा कोणी सहाय्यक त्यांच्या ऑफीसात नव्हताच. गेल्या दोन चार दिवसात कुरीयरकडून परत आलेल्या पत्रांच्या लहानशा गठ्ठ्यात माझ्या नावाचे काही नव्हते, एवढेच नव्हे तर गेल्या महिनाभरात ऑफीसकडून माझ्या नावे कोठलेही पत्र पाठवले गेल्याचीच मुळी नोंद नव्हती. शिवाय ऑफीसकडून बाहेर जाणारी ऑफीशियल पत्रे ऑफीसचा पत्ता छापलेल्या पाकिटांमधूनच पाठवली जातात आणि त्यावर पाठवणा-या व्यक्तीचे नाव कधीच लिहिले जात नव्हते हे मला आठवले. ऑफीसच्या पाकिटावर आपले नाव लिहून त्यातून व्यक्तीगत पत्र डिस्पॅचतर्फे पाठवण्याचा मूर्खपणा कोणीही करणार नाही याचीही मला जाणीव होती. त्यामुळे मला पत्र पाठवणारा हा घई माझ्या पूर्वीच्या ऑफीसातला नव्हता हे नक्की झाले.

मग तो कोण असेल? ते कसे शोधायचे? विचार करायलाही दिशाच दिसत नव्हती. अखेर जो कोणी असेल त्याला गरज असेल तर तोच पुन्हा आपल्याशी संपर्क साधेल असा विचार करून मी आपल्या कामाला लागलो. माझ्या मोटारीचा विमा संपत आला होता. त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक असल्याने विमा कंपनीचे ऑफीस गाठले. तिथे गेल्यावर पूर्वीच्या विम्याची पॉलिसी काढून तिथल्या माणसाला दाखवली. त्याला दाखवत असतांना मीही तिच्यावर एक नजर टाकली आणि डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्या पॉलिसीवर डेव्हलपमेंट ऑफीसर म्हणून पी एस घई यांच्या नावाचा रबरस्टँप मारलेला होता. माझ्या पॉलिसीची मुदत संपत आल्याकारणाने तिचे नूतनीकरण करण्यासाठी आठवण देणारे पत्र त्याच्या ऑफीसातून माझ्या नावे पाठवले गेले होते आणि पाकिटावर त्याच्या नावाचा शिक्का पडला असल्यामुळे कूरियरवाल्याने त्याचे नाव लिहिले असणार. संतोष हे त्या कूरियरच्या सहाय्यकाचेच नाव असणार.
या घईला शोधायची मी उगाचच घाई केली होती आणि त्याने पाठवलेल्या लिफाफ्यात काय असेल यावर इतके तर्क केले होते. मी घाई केली नसती तरी तो कोण आहे हे कळले असतेच. त्याचा लिफाफा मला मिळाला असता तरी त्यात मला काही लाभ नव्हता आणि नसला तरी त्याने माझे काहीच बिघडले नव्हते. घई या नवामुळेच मला घाई करायला उद्युक्त तर केले नसेल?

Wednesday, March 07, 2012

धुळवड, होली आणि जागतिक महिला दिवस

माझ्या लहानपणी ज्या प्रदेशात आम्ही रहात होतो त्या भागात तरी होळी पौर्णिमा किंवा शिमगा या उत्सवाला बरेच बीभत्स स्वरूप आले होते. घरात पुरणाची पोळी आणि कटाची आमटी खायला मिळत असल्याने आम्ही आनंदात असू, पण बाहेर जाऊन रस्त्यात चाललेल्या सार्वजनिक धिंगाण्यात आम्हाला सहभागी होता येत नव्हते. होळीच्या दहा बारा दिवस आधीपासूनच लाकडे आणि लाकडाच्या वस्तूंची पळवापळवी सुरू होत असे. काही वात्रट मुले आपण कुठून काय पळवून आणले याची फुशारकी मारायची, पण त्या वस्तू कुठे लपवून ठेवल्या आहेत याचा थांगपत्ता लागू देत नसत. ते शोधून काढून त्यावर डल्ला मारण्याचे काम आणखी कोणी करत असे. शेवटी सगळे अग्निनारायणाच्याच स्वाधीन करायचे असल्यामुळे तो चोरीचा अपराध समजला जात नसला तरी ते काम करणारा मुलगा सापडला तर त्याला भरपूर चोप मिळायचाच. स्वतःची असो किंवा त्याने ढापलेली असो, पण ज्याची वस्तू पळवली गेली जायची तो पळवणा-याच्या नावाने शंख करायचाच. होळीचा दिवस अगदी जवळ आल्यावर मुलांची टोळकी उघड उघडपणे घरोघरी जाऊन लाकडे जमवून आणत आणि जो कोणी देणार नाही त्याच्या घरासमोर शंखध्वनि करत. त्यामुळे बहुतेक लोक बंबात घालण्यासाठी किंवा चुलीत जाळण्यासाठी ठेवलेल्या ढिगामधून थोडी लाकडे, काटक्या, ढलपे वगैरे देत असत. काही मुले जमवलेल्या ज्वलनशील वस्तूंची राखण करायचे काम करत असत. होळीच्या दिवशी संध्याकाळ झाली की ते ढिगारे भर रस्त्यांत मधोमध आणून पेटवून दिले जात आणि रात्रभर ते जळत रहात. त्यावेळी तिथे जमलेल्या लोकांमध्ये गलिच्छ शिवीगाळ करण्याची चढाओढ चालत असे. आमच्या घरातले वातावरण जास्तच सोवळे असल्याकारणाने त्या गोंधळात सामील होण्याची परवानगी कधीच मिळाली नाही. पण गल्लीत चाललेला गोंधळ कानावर येत असे तसेच घराच्या गच्चीवरून दिसतही असे.
त्याच्या दुसरे दिवशी म्हणजे धुळवडीला गलिच्छपणाचा सुमारच नसे. होळीत जळालेल्या लाकडांची राख त्या दिवशी एकमेकांना फासायची असा पूर्वीचा रिवाज असला तरी त्या राखेतच माती, शेण आणि गटारातली कसलीही घाण मिसळून त्यात ज्याला त्याला लोळवणे चालत असे. ते करणा-या जमावाच्या हातात एकादा अनोळखी इसम सापडला तर त्याची पुरती वाट लावली जाई. असल्या धुडगुसात सामील होण्याचा विचारसुध्दा करणे आमच्या घरी कोणाला शक्य नसल्य़ामुळे धुळवडीच्या दिवशी सकाळी कुठल्याही कारणासाठी कोणीही बाहेर पडत नसे. त्या दिवशी कुठे कुठे कोणकोणते घाणेरडे प्रकार घडले याच्या बीभत्स पण सुरस कहाण्या पुढील काही दिवस कानावर येत रहात. मनातला सगळा ओंगळपणा या वेळी बाहेर काढून टाकायचा आणि त्याला स्वच्छ करायचे हा होळीच्या मागला उद्देश असतो असे सांगितले जात असले तरी त्याचा अतिरेक होत असल्यामुळे ते साध्य होत नसे. उलट त्यातून नवेच हेवे दावे निर्माण होत आणि झालेल्या अपमानाचे पुढल्या वर्षी उट्टे काढण्याचा निर्धार केला जात असे. शिमगा संपला तरी त्याचे कवित्व शिल्लक राहते अशी म्हणच पडली आहे ती त्यामुळेच.
होळी पौर्णिमेच्या दुसरे दिवशी सकाळी (आपल्या धुळवडीला) उत्तर भारतीय लोक रंग खेळतात. हिंदी सिनेमांमध्ये केले जाणारे होलीच्या उत्सवाचे प्रचंड उदात्तीकरण पाहून त्याचे पडसाद मुंबईसारख्या महानगरातील समाजातसुध्दा दिसायला लागले. मुंबईमधून तरी मराठी माणसांची परंपरागत रंगपंचमी आता लुप्तच झाली आहे असे दिसते. पुण्यासारख्या शहरात ती काही प्रमाणात खेळली जात असली तरी हिंदी सिनेमातल्या होलीची सर त्याला येत नाही. अणुशक्तीनगरसारख्या प्रामुख्याने शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांच्या वसाहतीत खूपच सभ्य वातावरणात होली खेळली जात असे. त्या दिवशी एकमेकांना (कडकडून) भेटणे, रंग उधळणे किंवा रंगाने माखणे याबरोबरच घरोघरी निरनिराळ्या मिठाया आणि नमकीन पदार्थ खायला मिळत आणि गाणी, विनोद वगैरेंच्या मैफली अंगावर टाकल्या जाणा-या रंगाइतक्याच रंगत असत. खरोखरच होलीचा त्योहार एक सांस्कृतिक उत्सव या भावनेने साजरा होत असे. उत्तर भारतीय आणि बंगाली लोक यात अमाप उत्साहाने भाग घेत असत आणि आम्हालाही त्यात सामील करून घेत असत. एक दोन वर्षातच आम्हीसुध्दा त्यात त्यांच्याइतक्याच उत्साहाने भाग घेऊ लागलो. लहानपणच्या काळात होळी किंवा धुळवड यात सामील होण्यास महिलावर्गाला सक्त मनाई होती. त्या दिवसात त्या कधी चुकूनसुध्दा घराबाहेर पडतसुध्दा नसत. पण अणुशक्तीनगरमधल्या होलीमधील रंगणे, रंगवणे, खाणेपिणे आणि गाणे वगैरे सगळ्या भागात त्या पुरुषवर्गाच्या दुप्पट उत्साहाने भाग घेत असत. सेवानिवृत्त होऊन वाशीला रहायला गेल्यानंतरसुध्दा दोन तीन वर्षे आम्ही होलीचा आनंद घेण्यासाठी पूर्वीच्या ठिकाणी जात होतो.

उद्या योगायोगाने धुळवड आणि होळीबरोबरच जागतिक महिला दिवससुध्दा आहे. एका बाजूला महिलांना पूर्णपणे निषिध्द असलेली धुळवड आणि त्याच दिवशी महिलांसाठी साजरा करण्यासाठी ठरवलेला त्यांचा खास दिवस. पूर्वीच्या काळातल्या शिव्यागाळीमध्ये नाहक आयाबहिणींचा उध्दार होत असे. आता तो प्रकार थांबला असेल तर चांगलेच आहे. त्या दिवशी महिला दिनाच्या निमित्याने त्यांचेबद्दल  काही गौरवास्पद बोलले आणि लिहिले गेले तर किती चांगले?