Thursday, May 29, 2014

आजीआजोबा आणि नातवंडे (भाग - १ ते ५)

हा लेख आधी पाच भागात प्रकाशित केला होता. ते पाचही भााग एकत्र केले दि.३१-०७-२०२१

आजीआजोबा आणि नातवंडे (भाग - १)

पन्नाससाठ वर्षांपूर्वीच्या आणि त्याआधीच्या काळात आपल्याकडे घरोघरी एकत्र कुटुंब पद्धत असायची, एका कुटुंबातली सगळी माणसे पिढ्या न् पिढ्या एकाच ठिकाणी आणि सगळी मिळून रहात असत. कुटुंबातली सारी मंडळी एकाच घरात रहात असल्यामुळे त्या काळातली बहुतेक सगळी नातवंडे जन्मल्यापासून आजीआजोबांच्या अंगाखांद्यावर खेळतच मोठी होत असत. त्यांच्या दरम्यान एक घट्ट नाते निर्माण होत असे. वयस्क झालेले आजीआजोबा प्रपंचाचा भार पुढल्या पिढीवर सोपवून आपला वेळ हरीहरी करण्यात आणि नातवंडांना खेळवण्यात घालवत असत. नातवंडांना आजीआजोबांचा भरपूर लळा लागत असे आणि आजीआजोबांना नातवंडांशिवाय करमत नसे. घरातल्या मोठ्या लोकांबरोबर आजीआजोबांचे कधी मतभेद झाले, त्यातून तात्पुरते वाद, गैरसमज, थोडा कडवटपणा वगैरे निर्माण झाले तरी नातवंडांशी वागतांना ते मेणाहून मऊ होत असत. त्यांचे आपसातले नाते नेहमी मधुर असेच रहात असे. आजीआजोबांच्या मनात नातवंडांच्याबद्दल अतीव प्रेम, माया, ममता, काळजी अशा भावनाच असत.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात कारखानदारी आणि उद्योगधंद्यांच्या वाढीला वेग येत गेला, तसेच दुस-या महायुद्धानंतरच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरही या क्षेत्रांमध्ये मोठे बदल होत गेले. या सर्व घडामोडींमधून नोकरी आणि व्यवसायाच्या अनेक नवनव्या संधी उपलब्ध होत गेल्या. त्या मुख्यतः महानगरांमध्ये निर्माण झाल्या. त्यांचा लाभ घेण्यासाठी खेडी आणि लहान गांवांमधून अनेक युवकांनी शहरांकडे धाव घेतली. तिथे गेलेल्यांना रोजगार मिळाला, पण राहत्या जागांची तीव्र टंचाई असल्यामुळे मिळेल त्या एक दोन खोल्यांच्या खुराड्यांमध्ये त्यांना संसार थाटावे लागले. त्यात रहात असतांना त्यांना आपल्या गावाची आणि कुटुंबातल्या माणसांची सारखी आठवण येत असे. त्यांचे आईवडील आणि इतर बरेच आप्तस्वकीय गावाकडेच रहात असत. त्या लोकांना भेटण्याची ओढ शहरात गेलेल्या लोकांना लागत असे. शक्य तितक्या वेळा गावाकडे जाऊन शक्य तितके दिवस तिथे राहण्याचे प्रयत्न ते करत असत. विभक्त झालेली कुटुंबेसुद्धा त्या काळात शक्य तितकी जवळ येत असत. अजूनही एकत्र असल्यासारखी वागत असत.

नोकरी किंवा व्यवसायासाठी शहरात जाऊन स्थाइक झालेल्या लोकांनी संसारात स्थिरस्थावर होऊन आणि लग्न करून त्यांना मुले होईपर्यंतच्या काळात त्यांच्यातल्या बहुतेकांचे आजीआजोबा काळाच्या पडद्याआड गेले होते, पण गावांकडे रहात असलेले त्यांचे आईवडील आता आजीआजोबा झाले. त्यांची शहरातली नातवंडे त्यांना रोज भेटत नव्हती. पण आपल्या आईवडिलांबरोबर ती अधूनमधून गावाकडे येत असत. दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये काही आठवडे तिथे रहातही असत. आजीआजोबांचे ग्रामीण भागातले प्रशस्त घर, त्याच्या आजूबाजूची मोकळी जागा, गावाजवळील शेते, नदी, डोंगर, त्यावरची झाडेझुडुपे, पानेफुले, फुलपाखरे, चिमण्या, राघूमैना आदि पक्षी, गोठ्यातल्या गायीम्हशी आणि त्यांची वासरे, गावातल्या शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, तिथली मोकळी स्वच्छ हवा, रात्री आकाशात लुकलुकणा-या लक्षावधी चांदण्या या सगळ्यांचे त्या मुलांना अप्रूप वाटत असे.

आजोबा त्यांना आपल्यासोबत फिरायला किंवा देवळात घेऊन जात, आजी छान छान पदार्थ करून खायला घालत असे, दोघेही मजेदार गोष्टी सांगत. वेगवेगळ्या शहरांमधून आलेली नातवंडे आणि त्या गावातच स्थाइक झालेल्या नातेवाइकांची मुले यांची गट्टी जमत असे. आपापल्या गावांतल्या मजा आणि शाळांमधल्या गोष्टी ते एकमेकांना सांगत असत, नवनवे खेळ खेळत, पोहणे, सायकल चालवणे वगैरे शिकून घेऊन त्याचा सराव करत. एकंदरीत त्या काळातली ही नातवंडे त्यांच्या आजीआजोबांवर खूष असत. सुटी संपून आपल्या शहराकडे परत जातांना तीही रडवेली होत असत आणि आजीआजोबांनाही गदगदून येत असे. पण त्या काळातल्या गोड आठवणी ते जपून ठेवत आणि एकमेकांना सांगून जाग्या ठेवत असत. नातवंडांनाही पुन्हा पुन्हा गावाकडे जाण्याची ओढ वाटत असे आणि त्या संधीची ते उत्सुकतेने वाट पहात असत. तिथे जाऊन पोचताच धावत पुढे जाऊन ते  आजीआजोबांच्या गळ्यात पडत.

असाच आणखी पंचवीसतीस वर्षांचा काळ लोटला. आईवडिलांच्यासोबत शहरांमध्ये राहणारी आणि सुट्यांमध्ये गावाकडे जाऊन आजीआजोबांना भेटून येणारी नातवंडे लहानाची मोठी झाली. त्यांच्या आईवडिलांनी काटकसरीने संसार करून आपल्या मुलांना शक्य तितके चांगले शिक्षण दिले होते. शिक्षणाच्या क्षेत्रातही प्रगती होऊन अनेक नवे मार्ग उपलब्ध झाले होते, उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप्स आणि कर्ज मिळू लागले होते. या सगळ्यांचा लाभ घेऊन त्या मुलांनी शिक्षणात खूप प्रगती केली. मोठ्या पदव्या संपादन केल्या आणि त्यांच्या आधारावर त्यांना चांगल्या नोक-या मिळाल्या. काही जणांनी त्याच शहरात रहायचे ठरवले आणि त्यांना तिथेच चांगल्या नोक-या मिळाल्या, काही जण नोकरीसाठी परप्रांतात तर काही जण साता समुद्रापलीकडे परदेशात गेले. काही मुले उच्च शिक्षणासाठी म्हणून परदेशी गेली आणि तिकडेच राहिली. त्या सर्वांनी आपापल्या ठिकाणी संसार मांडले.

मध्यंतरीच्या काळात त्यांच्या कुटुंबांमधील इतरांच्या परिस्थितीतही फरक पडत गेला. ग्रामीण भागातील एकत्र कुटुंबांमधून नोकरीसाठी मोठ्या शहरात आलेल्या बहुतेक लोकांचे आईवडील स्वर्गवासी झाले. त्यांची जुनी घरे मोडकळीला आली आणि दूर राहून त्यांची देखभाल आणि दुरुस्ती करत राहणे शक्य होत नसल्याने ती विकून टाकली गेली. गावातले बरेचसे इतर नातेवाईकसुद्धा आपले गाव सोडून किंवा हे जग सोडून गेले. त्यामुळे शहरात रहायला आलेल्या लोकांना आता गावाकडे जायचे कारण उरले नाही. त्याच्यासाठी तो मार्ग कायमचा बंद झाला. कालांतराने ते लोक नोकरीमधून निवृत्त झाले पण आपल्या मूळ गावी परत जाऊ शकत नव्हते. पूर्वी जेंव्हा ते शहरात रहायला आले होते तेंव्हा त्यांचे आईवडील खेडेगाव सोडून शहरात न येता मागेच राहिले होते. आता ते लोक त्यांच्या मुलांकडे परप्रांतात किंवा परदेशात जाऊ शकत नव्हते. त्यांनी ज्या शहरात सारा जन्म घालवला तिथेच ते स्थाईक झाले. ज्यांना शक्य झाले त्या लोकांनी चांगल्या सदनिका घेतल्या आणि एक दोन खोल्यांच्या जुन्या घरातून ते तिथे रहायला गेले.

 या लोकांचा जन्म जुन्या काळातल्या एकत्र कुटुंबांमध्ये झाला होता. त्यांचे बालपण माणसांनी गजबजलेल्या घरांमध्ये व्यतीत झाले होते. नोकरीत असतांना दिवसाचा सगळा वेळ कामातच जात होता आणि घरी आल्यावर मुलांची गोड संगत होती. आता वार्धक्यात मात्र जेंव्हा त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे त्या वेळी त्याच्या सोबत कोणीही नाही. लहानपणच्या आठवणी व्याकूळ करतात. काही घरी तर आजी किंवा आजोबा यांच्यातला फक्त एकच शिल्लक राहिला आहे. त्यांना तर अगदीच एकाकी रहावे लागत आहे.

काही लोक या बाबतीत सुदैवी आहेत. त्यांची मुले आणि नातवंडे त्यांच्या सोबतीला रहात आहेत. पण त्यांचे वेगळे प्रश्न आहेत. पूर्वीच्या म्हणजे या लोकांच्या आजोबांच्या काळात एकत्र कुटुंबात राहणा-या मंडळींचा उदरनिर्वाह मुख्यतः शेती, दुकानदारी किंवा पारंपरिक व्यवसायांमधून होत असे. त्यामधून मिळणारे उत्पन्न त्यांच्या घरात येत असे आणि सगळ्या कुटुंबावर खर्च होत असे. कुटुंबप्रमुख किंवा घरातील वडीलधारी मंडळींच्या सांगण्यानुसार घरातले व्यवहार चालत असत. त्या काळातले जीवन चाकोरीबद्ध असायचे. दिवस उजाडताच उठल्यापासून ते रात्र पडल्यानंतर झोपी जाईपर्यंत सगळ्यांनी कोणकोणत्या क्रमाने काय काय करायचे हे परंपरेने ठरलेले असायचे. स्वयंपाकघरात जे काही शिजवलेले असेल ते अन्न सारेजण जेवणाच्या वेळी एकत्र जमून खात असत. वडीलधारी लोकांसमोर लहानांनी आवाज चढवायचा नाही अशी सर्वांना सक्त ताकीद असे आणि ती पाळली जात असे. त्या काळातल्या आजीआजोबांना कुटुंबात सर्वोच्च अधिकाराचे, मानाचे आणि महत्वाचे स्थान असायचे.

आजची परिस्थिती वेगळी आहे. सेवानिवृत्त झालेल्या आजीआजोबांकडे उत्पन्नाचे स्वतःचे फारसे स्त्रोत नसतात. त्यांची मुले आणि सुना यांची कमाई परस्पर त्यांच्या खात्यांमध्ये जमा होते आणि त्या पैशांचा विनियोग कसा करायचा हे तेच ठरवतात. व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पना विस्तारल्या आहेत. झोपणे, उठणे, खाणे, पिणे, बाहेर जाणे, घरी परत येणे वगैरेंसाठी ठराविक नियम पाळले जात नाहीत. आजीआजोबांची काळजी घेतली जाते, त्यांची विचारपूस केली जाते, पण घर चालवण्यातल्या इतर बाबतीत त्यांना फारसे विचारले जात नाही.  त्यांची जागा कुटुंबप्रमुखाची राहिली नाही. तिचे काही प्रमाणात अवमूल्यन झाले आहे.

 . . . . . .  . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

आजीआजोबा आणि नातवंडे (भाग २)

आजच्या काही आजीआजोबांची मुले आणि नातवंडे त्यांच्याबरोबर एकाच घरात राहतात, त्यांच्या घराहून थोड्या अंतरावरील वेगळ्या घरांमध्ये किंवा जवळच्या दुस-या गावात राहणारी काही आजीआजोबांची मुले आणि नातवंडे त्यांना वरचेवर भेटत असतात आणि काहीजण फारच दूरच्या गावी किंवा परदेशात रहात असल्यामुळे त्यांना खूप दिवसांनंतर भेटतात. त्या सर्वांच्या बाबतीतले अनुभव अर्थातच थोडे वेगवेगळे असतात. त्यांचे काही नमूने या भागात पाहू.

पहिले आजी आणि आजोबा त्यांच्या कमावत्या मुलाकडे राहतात. त्यांच्या नातवंडांचे हंसरे चेहरे त्यांना रोज दिवसभर पहायला मिळतात. कदाचित तेवढ्या आनंदासाठीच ते तिथे रहात असावेत असेही काही वेळा वाटते. त्यांचा मुलगा आणि सून दोघेही कामावर जातात आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात (आयटीमध्ये) असल्यामुळे त्यांना घरी परत यायला बराच उशीर होतो आणि मग त्यानंतर झोपायला आणि दुसरे दिवशी सकाळी उठायलाही उशीर होतो. त्यामुळे या आजीआजोबांच्या नातवंडांना सकाळी वेळेवर उठवणे, त्यांना न्हाऊ माखू घालून आणि गणवेष चढवून तयार करणे, त्यांना शाळेत नेऊन पोचवणे, शाळा सुटल्यावर घरी परत आणणे, त्यांचा नाश्ता, जेवणखाण वगैरे तयार करून त्यांना खायला घालणे वगैरे सगळी रोजची कामे बहुतेक दिवशी आजी आणि आजोबाच करतात. शिवाय त्यांचा अभ्यास, खेळ, मनोरंजन वगैरेकडेही त्यांनाच पहावे लागते. हे करतांना त्यांच्या मनाला खूप आनंद मिळत असला तरी वयोमानानुसार थकलेले शरीर हवी तेवढी साथ देत नाही. कधी मुलांच्या मागे धावतांना त्यांच्या छातीत धाप लागते तर कधी वाकून एकादी वजनदार वस्तू उचलतांना त्यांच्या कंबरेत उसण भरते. पाठदुखी, सांधेदुखी वगैरे अधून मधून हजेरी लावत असतात. काही वेळा काही गोष्टींचे विस्मरण झाल्याने त्यांच्या लक्षात रहात नाहीत. त्या आयत्या वेळी करण्यात धांदल होते. असे सगळे असले तरी ठरलेली रोजची कामे तर त्यांनाच तसेच रखडत खुरडत आटोपावी लागतातच.

दिवसभरातल्या सान्निध्यामुळे नातवंडांना आजीआजोबांचा लळा लागतो, पण ती आपल्यापासून दूर तर राहणार नाहीत अशी एक सुप्त आशंका कदाचित त्यांच्या आईवडिलांच्या मनात उठत असावी. आपल्या मुलांना आपण पुरेसा वेळ देऊ शकत नाही याची खंतही त्यांच्या मनात कुठेतरी बोचत असते. त्यामुळे त्यांच्या कामामधून त्यांना जेवढा मोकळा वेळ मिळतो त्यात ते लोक या उणीवेची पुरेपूर भरपाई करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यासाठी मॅकडोनाल्ड, पिझ्झाहट, भेळपुरीवाला किंवा पावभाजीवाला अशासारख्या मुलांच्या आवडत्या ठिकाणी त्यांना घेऊन जातात, त्यांना हवे तेवढे आइस्क्रीम खाऊ घालतात, मॉल्समध्ये नेऊन तिथले गेम्स खेळायला देतात, मुलांनी मागितलेल्या आणि न मागितलेल्या वस्तूंचे आणि विविध खमंग खाद्य पदार्थांचे ढीगच्या ढीग घरी आणतात. शिवाय बुद्धीवर्धक, शक्तीवर्धक, उत्साहवर्धक, उंची वाढवणारी वगैरे अनेक प्रकारची टॉनिके आणून ठेवतात आणि मुलांना ती नियमितपणे द्यायच्या सूचना आजीआजोबांना देतात. म्हणजे मुलांनी काय काय खावे हे त्यांचे आईवडील ठरवणार आणि त्यांना ते खायला घालायचे आजीआजोबांनी असे चालते. चटपटीत पदार्थ खाण्याची गोडी लागल्यावर आपल्याला आज आत्ता अमूक तमूकच खायला पहिजे असे मुलांनी हट्ट धरले तर ते पुरवणे आजीआजोबांना बरेच वेळा शक्य नसते किंवा त्यांना ते योग्य वाटत नाही. पण ते नाकारण्याचे परिणाम मात्र शेवटी त्यांनाच भोगावे लागतात.

आईवडिलांच्या मनातली असुरक्षिततेची भावना (इनसिक्यूरिटी) काही वेळा वेगळ्या स्वरूपात व्यक्त होते. घराबाहेर घडलेल्या एकाद्या घटनेमुळे किंवा इतर काही कारणाने वैतागून किंवा कोणावर तरी चिडून ते घरी आलेले असतात आणि त्यांच्या मनातला त्याबद्दलचा राग त्यांच्या एकाद्या मुलाची फारशी मोठी चूक नसतांनासुद्धा त्याच्या अंगावर ओरडण्यात बाहेर पडतो. पण या वेळी आजीआजोबांनी मध्ये पडून त्यांची समजूत घालण्याची चूक करता कामा नये. नाही तर "तुम्ही मुलांच्या समोर मला चुकीचे कसे काय ठरवता? त्यांना माझ्याबद्दल काय वाटेल? यामुळे त्यांच्या मनातून मी उतरणार नाही का?" वगैरे वगैरे मुक्ताफळे ऐकून घ्यावी लागतात. याच्या उलट एकाद्या वेळी एकाद्या मुलाच्या हटवादीपणाला कंटाळून आजीआजोबांनी त्याला जरासे दटावले तर त्याचा रिपोर्ट रात्री आईवडिलांकडे जातो आणि "तो तर अजून लहान आहे, मोठ्यांनी त्याला समजून घ्यायला नको का? त्याला हो म्हंटलं असतं तर एवढं मोठं काय बिघडणार होतं? लहान मुलांना उगाच काय रडवायचे?" वगैरे वाक्ये सुनावली जातात. आपल्या नातवंडांवर आपण केंव्हा माया दाखवायची किंवा त्याच्यावर जरासे रागवायचे हे सुद्धा आपल्याला ठरवता येत नसले तर आपल्या अस्तित्वाला काय अर्थ आहे? असा प्रश्न अशा वेळी त्यांच्या मनात येतो.

आपल्यावर अशी वेळ येऊ नये यासाठी दुस-या आजीआजोबांनी खूपच आधीपासून सगळी तयारी करून ठेवली होती. ते दोघेही सरकारी नोकरीत होते त्यामुळे दोघांनाही निवृत्तीवेतन (पेन्शन) मिळते. जीवनाच्या मूलभूत गरजा पुरवून झाल्यावर थोडी मौजमजा करून आरामात राहण्यासाठी तेवढे उत्पन्न पुरेसे असते. नोकरीवर असतांनाच्या ज्या काळात त्यांच्या हातात जास्तीचे चार पैसे यायचे तेंव्हाही ते चैन करण्यात उधळून त्यांनी स्वतःला नसत्या महागड्या संवयी लावून घेतल्या नव्हत्या. ते पैसे साठवून ठेऊन उतारवयासाठी तरतूद करून ठेवली होती. "एका म्यानात दोन तलवारी रहाणार नाहीत" या चालीवर "एका छपराखाली दोन मिसेस क्षक्ष नकोत" हे ब्रीदवाक्य ते आधीपासून इतरांना सांगत असत आणि त्यांनी स्वतःच्या जीवनात ते अंमलात आणले.

उगाच भांड्याला भांडे लागून त्याचा ठणठणाट होऊ नये आणि ती एकमेकींना आपल्याआप लागली की मुद्दाम एकमेकींवर आदळली यावरून अधिक गोंगाट होऊ नये याची त्यांनी काळजी घेतली. आपल्या मुलाचे लग्न ठरवायच्या आधीच त्याच्यासाठी सुसज्ज असा वेगळा फ्लॅट घेऊन ठेवला आणि लग्नानंतर नवदांपत्याला तिकडे रहायला पाठवून दिले. त्यांच्या कुटुंबात नातवंडांचे आगमन झाल्यानंतरसुद्धा सुरुवातीचे काही महिने ते एकत्र येऊन राहिले आणि स्वतंत्रपणे राहण्याजोगी परिस्थिती येताच मुलाचे कुटुंब आपल्या फ्लॅटवर रहायला चालले गेले. वेळोवेळी पडणारी गरज आणि त्या वेळी सर्वांची सोय यांचा विचार करून कधी आजी किंवा आजोबा किंवा ते दोघेही त्यांच्या मुलांकडे जाऊन राहतात किंवा नातवंडांना त्यांच्या आजीआजोबांच्या घरी आणून ठेऊन त्या बालकांचे आईवडील दुसरीकडे त्यांच्या इच्छित स्थळी जाऊन येतात. काही काळ तर आजोबा रोज सकाळची कामे आटोपल्यानंतर नातवंडांना सांभाळण्यासाठी मुलाकडे जाऊन बसत आणि संध्याकाळी आपल्या फ्लॅटवर परत येत असत. एक प्रकारचे विस्कळित पण एकत्र कुटुंब असे त्यांना म्हणता येईल. यात सर्वांनाच आपापली स्पेस मिळते आणि सगळेच सुखी असावेत असे वर वर पाहता वाटते. पण गरज नेहमीच सांगून पडत नाही आणि त्या वेळी गरज जास्त महत्वाची की सोय असा तिढा पडला तर काय करायचे यासारखे प्रश्न त्यांना पडत असतीलच.

लहान घरात राहणे फारच अडचणीचे होते, तिथे कोणालाच थोडीही प्रायव्हसी मिळत नाही, यामुळे आजीआजोबानी त्यांच्या मुलांच्या आणि नातवंडांच्यासह त्यांच्या एक दोन खोल्यांच्या जुन्या घरात राहणे अशक्यच असते. सर्वांनी मिळून एकत्र राहण्याच्या दृष्टीने मोठे घर घेतले तरी त्यात पहिल्या उदाहरणात दिल्याप्रमाणे काही अडचणी येत असतात. वर दिलेल्या दुस-या उदाहरणातल्या आजीआजोबांनी स्वतःच पुढाकार घेऊन मुलाला वेगळा संसार थाटायला सांगितले असे ते सांगत तरी असतात. पण मुलांना अधिक स्वातंत्र्य हवे असते किंवा त्यांना घरात रोज कुरबुर नको असते म्हणून ते स्वतःहून वेगळे होतात असेच सर्वसाधारणपणे दिसते. आर्थिक दृष्ट्या पाहता त्यांनाच ते शक्य असण्याची जास्त संभावना असते. त्यांच्या पगाराच्या आधारावर त्यांना दीर्घ मुदतीचे गृहनिर्माणकर्ज मिळू शकते. साठी उलटून गेलेल्या आणि नियमित मासिक उत्पन्न नसलेल्या आजोबांना कोणती बँक कर्जपुरवठा करणार आहे? जे आजीआजोबा वेगळ्या घरात पण त्यांच्या मुलांच्या घरापासून जवळच रहात असतात त्यांना नातवंडांशी सतत संपर्क ठेवता येतो, पण ते एकाच शहरात असूनसुद्धा दूरदूरच्या निरनिराळ्या उपनगरांमध्ये रहात असले तर गर्दीने गच्च भरलेल्या लोकल गाडी किंवा सिटीबस यांच्यासारख्या सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करून नातवंडांना भेटायला जाणे आजीआजोबांच्या आवाक्याबाहेर होते. त्यांची मुलेच नातवंडांना घेऊन त्यांच्याकडे आली किंवा त्यांना आपल्या सोबत त्यांच्या घरी घेऊन गेली तरच त्यांचे भेटणे शक्य होते. यामुळे अडचणींमुळे त्यांच्या भेटीगाठी कमी होत जातात आणि त्या प्रमाणात लळा, जिव्हाळाही कमी होतो.

आजीआजोबा आणि नातवंडे (भाग ३)

आजकालच्या अनेक आजीआजोबांची मुले गेली बरीच वर्षे परदेशात रहात आहेत किंवा तिकडेच स्थायिक झाली आहेत. अशा आजीआजोबांची नातवंडे तिकडेच लहानाची मोठी होत असतात. इथे राहणा-या आजीआजोबांना त्यांचे फोटो आणि व्हिडिओ घरबसल्या इंटरनेटवर पहायला मिळतात, त्यांच्या बोबड्या बोलांचे किंवा चिवचिवाटाचे आवाज कानावर पडतात, पण हे म्हणजे ग्लासभर मलईदार दुधाच्या जागी चमचाभर पातळ पुचुक ताक पिण्यासारखे झाले. त्याने तहान भागत तर नाहीच, उलट ती जास्तच वाढते. परदेशात आपल्या मुलांकडे जाऊन त्यांना भेटायचे झाल्यास पासपोर्ट, व्हिसा वगैरे काढून घ्यावे लागतात. बहुतेक लोक एवढे काम उत्साहाने करतात. कधी कधी त्यातच काही अडचणी आल्या तर मग मात्र परदेशी जाणे अशक्य होते.

ही पूर्वतयारी करून ठेवल्यावरसुद्धा विमानाच्या तिकीटांची व्यवस्था करणे हे एक मोठे काम असते. परदेशी जाऊन येण्याच्या तिकीटांच्या किंमती डॉलर, पौंड स्टर्लिंग किंवा युरो या चलनांमध्ये सुद्धा हजारांच्या घरात असतात, रुपयांमध्ये त्या लाखांमध्ये होतात. आजीआजोबांनी त्यांच्या आयुष्यात रुपयांमध्ये कमाई करून त्यातून टाकलेल्या शिल्लकीचा विचार करता तिकिटांच्या किंमती फार जास्त वाटतात. परदेशात राहणा-या मुलांच्या कमाईच्या तुलनेतसुद्धा त्या अगदीच क्षुल्लक नसतात. शिवाय त्यांच्या घरातल्या सर्वांना ऑफीस आणि शाळांमधून एकाच वेळी सुटी मिळणेही कठीण असते. याचे आधीपासून नियोजन करता आले नाही तर आयत्या वेळी काढलेल्या तिकीटांना अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागतात. यापेक्षा आईवडिलांची विमानाची तिकीटे चार पाच महिने आधी काढून ठेवली तर ती किफायतशीर भावात मिळतात आणि त्यांच्याकडे पाठवून त्यांना तिकडे बोलावून घेणे जास्त सोयिस्कर वाटते.

ज्या आजीआजोबांनी आयुष्यात कधीच परदेशगमन केले नसते त्यांनीही तिकडच्या सुबत्तेबद्दल खूप वर्णने वाचलेली आणि ऐकलेली असतात. तिकडे एकदा तरी प्रत्यक्ष जाऊन ते सगळे पाहून येण्याबद्दल त्यांच्या मनात खूप उत्सुकता असते. "चल रे भोपळ्या टुणुक टुणुक" या गोष्टीमधल्या म्हातारीप्रमाणे ते लोकसुद्धा "लेकाकडे जाईन, छान छान खाईन, लठ्ठ होऊन येईन." असे मोठ्या उत्साहाने स्वतःला आणि परिचितांना सांगत असतात. तिकडे जाऊन पोचल्यानंतर तिथल्या विमानतळापासूनच तिकडची शहरे, रस्ते, त्यावरून धावणारी वाहने, रस्त्याच्या बाजूला दिसणारी सुबक घरे वगैरे पाहून प्रथम दर्शनी ते थक्क होतात. पण तिथे रहायला लागल्यानंतर हळूहळू त्यांचा प्रभाव कमी कमी होत जातो.

पुढे दिलेल्या तिस-या उदाहरणातल्या आजीआजोबांनी असेच अमेरिकेकडे प्रयाण केले आणि ते आपल्या मुलाच्या गावी जाऊन पोचले. त्यांचा मुलगा आणि सून यांनी विमानतळावर त्यांचे खूप प्रेमाने स्वागत करून त्यांना घरी नेले. आपल्या नातवंडांना जवळ घेऊन कुरवाळण्यासाठी, त्याच्या गोब-या गालांचे पापे घेण्यासाठी, त्यांच्या रेशमासारख्या मऊ केसांमधून बोटे फिरवण्यासाठी आजीआजोबा जास्त आसुसलेले होते, पण ती लहान बालके मात्र बिचकल्यामुळे त्यांच्यापासून जरा दूरदूरच रहात होती. त्यांच्या अंगाला हात लावू देत नव्हती. तो सगळा दिवस त्यांच्याशी ओळख करून घेण्यात गेला. खूप प्रयत्नांनंतर आणि वेगवेगळे छान छान खाऊ दिल्यानंतर अखेरीस ती दोघे त्या आजीआजोबांना 'बिग् हग्' द्यायला एकदाची तयार झाली.

दुसरे दिवशी सकाळी त्या आजीआजोबांचा मुलगा आणि सून आपापल्या गाड्यांमध्ये बसून आपापल्या ऑफिसांना चालले गेले. त्यांनी जाता जाता मोठ्या मुलाला त्याच्या शाळेत आणि धाकटीला तिच्या शिशुसंगोपनगृहात नेऊन सोडण्याची व्यवस्था केली. भारतातून आलेल्या आजीआजोबांना तिथली कसलीच माहिती नसल्याने ते यात काहीच करू शकत नव्हते. मुलांसोबत जाऊन त्या जागा एकदा पाहून ठेवायच्या म्हंटले तरी त्यांना घरी परत आणून सोडावे लागले असते, त्यात सकाळच्या गडबडघाईतला अमूल्य वेळ गेला असता. आपल्यापाशी मोटार असल्याशिवाय आणि ती चालवता येत असल्याशिवाय कुठेही जाणे येणे तिकडे शक्य नसते. यामुळे नंतरही मुलांना शाळेत पोचवण्याचे किंवा त्यांना घरी घेऊन येण्याचे काम ते करू शकणार नव्हते. या कारणाने नातवंडांच्या परत येण्याची वाट पहात ते घरी बसले. तिथल्या स्वयंपाकघरातली बरीचशी साधने त्यांच्या ओळखीची नव्हती. ती कशी चालवायची याची पुरेशी माहिती नव्हती. तिकडच्या टीव्ही चॅनेलवरचे कार्यक्रम समजत नसल्यामुळे त्यात मन रमत नव्हते. घराजवळच्या रस्त्यांवर सुसाट वेगाने धावणा-या मोटारीच दिसत होत्या. काही ठिकाणी तर फूटपाथच दिसत नव्हते आणि त्यावर पायी चालणारे लोकच दिसत नव्हते. अशा त्या अनोळखी प्रदेशातल्या घराबाहेर पडण्याचे त्यांचे धाडस झाले नाही. त्यामुळे ते एकमेकांकडे आणि घराच्या भिंती आणि छताकडे पहात बसले.

दुसरा, तिसरा, चौथा वगैरे दिवसही असेच गेले. या काळात हळू हळू नातवंडांशी घसट किंचितशी वाढत गेली, त्याचबरोबर तिकडची जीवन रहाणी समजत गेली. त्या आजीआजोबांचा मुलगा आणि सून रोज सकाळी कॉर्न फ्लेक्स, टोस्ट, फ्रूट ज्यूस वगैरेचा नाश्ता करून ऑफिसला जात आणि त्यांचे दुपारचे जेवण तिथेच करीत असत. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेली फूड पॅकेट्स बाहेर काढून ओव्हनमध्ये तापवली की त्यातून बरेच वेळा रात्रीचे वेळचे जेवण होत असे. रुचिपालट म्हणून कधी ते लोक घरी येतांना पिझ्झा, बर्गर वगैरे तयार पदार्थ घेऊन येत. आजीआजोबांसाठी ते एकाद्या इंडियन टेकअवे मधून काश्मिरी पुलाव, आलू पराठा, रवा मसाला डोसा वगैरे घेऊन आले. लहान मुलांसाठी पचायला सुलभ आणि पौष्टिक पदार्थांची वेगळी पॅकेट्स असायची. ती गरम पाण्यात किंवा दुधात मिसळली की त्यांचे अन्न तयार होत असे. स्वयंपाकघरात तवा, परात, पोळपाट लाटणे, कढई, पळी वगैरे वस्तू होत्या, पण त्यांचा रोज वापर होत नसे. हौस म्हणून कधी एकादा वेगळा खाद्यपदार्थ करावासा वाटला किंवा एकाद्या नव्या रेसिपीवर प्रयोग करून पहायचा असला तर तेवढ्यासाठी त्या वस्तू बाहेर काढल्या जात असत. भारतातून येतांना आणलेल्या प्रेशर कुकरचा व्हॉल्व्ह उडला होता तो तिथे बदलून मिळत नव्हता आणि प्रेशर पॅनची शिट्टी हरवली होती, ती ही मिळत नव्हती. त्यामुळे या वस्तूंचा उपयोग होत नव्हता.

शनिवार रविवारी घरातले सगळेजण मोटारीतून शहराच्या आजूबाजूच्या भागात फिरून आले, आजीआजोबांना तिथली खास सौंदर्यस्थळे दाखवली गेली, मुलेही औटिंगमुळे खूष झाली. मौजमजा करून घरी परत येतांना त्यांनी  मॉल्समधून आठवडाभराचे सामान आणले. त्यात मुख्यतः.अनेक प्रकारची फूड पॅकेट्स होती. घरातल्या अवाढव्य आकाराच्या रेफ्रिजरेटरमध्ये ती रचून ठेवली गेली. पुढल्या आठवड्यातल्या रोजच्या आहारासाठी त्यांचा उपयोग करायचा होता. साधेच पण ताजे शिजवलेले अन्न रोजच्या जेवणात खायची सवय असलेल्या आजीआजोबांच्या तिकडचे अशा प्रकारचे भोजन पचनी पडले नाही. आता आपणच रोज ताजे अन्न शिजवून सर्वांना खाऊ घालायचे असे त्यांनी ठरवले. पटेल, शहा किंवा मेहबूब अली अशा कुणाकुणाच्या 'देसी' स्टोअर्समधून डाळ, तांदूळ, रवा, बेसन वगैरे पदार्थ आणले. गहू किंवा जोंधळे विकत आणून ते चक्कीमधून दळून आणणे तिकडे कल्पनेच्या पलीकडले होते. जी कोणती तयार पिठे बाजारात मिळाली ती आणून त्यांचेवर प्रयोग करायचे ठरवले. स्वयंपाकघरातली आधुनिक साधने वापरणे आजीआजोबांनी शिकून घेतले आणि ते त्यावर स्वयंपाकाचे प्रयोग करायला लागले.

स्वयंपाकाचा जन्मभराचा अनुभव असल्यामुळे नव्या ठिकाणी मिळतील ती उपकरणे वापरून वरणभात, पोळीभाजी वगैरे जेवण तर ठीकठाक तयार झाले, पण ते करतांना ढीगभर खरकटी भांडी साचली. ती कुणी घासायची? तिकडे अमेरिकेत केरवारा, धुणीभांडी वगैरे घरकामे करायला कामवाली (गंगू)बाई येत नसते. ती सगळी कामे ज्याने त्याने स्वतःच करावी लागतात. त्यासाठी यांत्रिक मदत उपलब्ध असली तरी ती सगळी यंत्रे चालवण्यासाठी माणसांची गरज असतेच. त्यासाठी थोडे श्रम करावे लागतात, बराच वेळ द्यावा लागतो. रिकामटेकड्या आजीआजोबांनी आता ही कामे आपल्याकडे घेतली किंवा त्यांना ती घ्यावी लागली.

ऊन ऊन तूप मेतकूट मऊ भात, साजुक तुपातला बदामाचा शिरा, बेदाणे घातलेले बेसनाचे लाडू वगैरेसारखे खास पदार्थ करून ते आपल्या नातवंडांना आपल्या हातांनी भरवायचे असे आजींचे एक स्वप्न होते. पण त्या मुलांना त्यात फारसा इंटरेस्ट दिसला नाही. त्यांच्या कानावर थोडे मराठी शब्द अधून मधून पडत असल्याने कदाचित त्यांना ते कळत असावेत, पण त्यांना शाळेत आणि समाजात वावरतांना सोपे जावे म्हणून त्यांचे आईवडील त्यांच्याशी शक्य तोंवर इंग्रजीमध्येच बोलत असत. यामुळे नातवंडेही त्याच भाषेत मोडके तोडके बोलायचे प्रयत्न करत. त्यांच्या बोलण्यात फारसे मराठी शब्द कधी येतच नव्हते. नातवंडांच्या इंग्रजी भाषेतल्या बोबड्या बोलांचा अर्थ लावणे आजीआजोबांना जमत नव्हते आणि त्यांचे बोलणे त्या मुलांना कितपत समजत आहे याचा त्यांना अंदाज येत नव्हता. त्यामुळे काही दिवस उलटून गेल्यानंतरसुद्धा त्यांच्यात संवाद असा साधला जातच नव्हता. हावभाव आणि खाणाखुणांमधूनच थोडेसे बोलणे होत होते तेवढेच. शाळेतून घरी आल्यानंतर बहुतेक सगळा वेळ ते त्यांच्या आईवडिलांच्या आसपासच घुटमळत असत किंवा टीव्हीवर कारटून पहात बसत. त्यांच्या इवल्याशा जगात आजीआजोबांना शिरकाव मिळत नव्हता, किंवा तसे त्यांना जाणवत नव्हते.

काही दिवस, आठवडे, महिने गेल्यानंतर त्यांची भारतात परत येण्यासाठी निघायची तारीख जवळ आली. पण त्याआधीच ते तिथल्या राहण्याला कंटाळले होते. दिवसभर घरी बसून राहणे म्हणजे त्यांना स्थानबद्ध झाल्यासारखे वाटायला लागले होते. टेलिफोन, टेलिव्हिजन, इंटरनेट वगैरे माध्यमांमधून बाहेरच्या जगाशी थोडासा संपर्क करू शकत होते, पण त्यांना मात्र इतर माणसांना प्रत्य़क्ष भेटणे आणि बोलणे हवे असायचे, ते फारच कमी झाले होते. त्यांची मुले आणि नातवंडे दिवसभरातला बहुतेक वेळ घराबाहेरच असल्यामुळे त्यांचा सहवासही म्हणावा तितका मिळत नव्हता. भारतात असतांना करावे न लागणारे कंटाळवाणे घरकाम तिथे करावे लागत होते. शिवाय त्यांच्या डोक्यावर एक टांगती तलवार होती. तिकडे जातांना त्यांनी आरोग्यविमा उतरवला असला तरी त्या विम्याच्या कलमांनुसार आधीपासून असलेल्या आजारांवर तिकडच्या डॉक्टर्सकडून उपचार होणार नव्हते. त्यावरील सगळी औषधे त्यांनी भारतातून जातांना त्यांच्यासोबत नेली असली तरी काही कारणाने आधीच्या व्याधी बळावल्या तर त्यावर तिथल्या रुग्णालयांमध्ये उपचार करून घेणे परवडण्यासारखे नव्हते. मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या उतारवयातल्या व्याधी त्यांनाही जडलेल्या होत्या आणि त्यांच्यामुळे इतर कुठली दुखणी कधी उद्भवतील किंवा डॉक्टर तसे म्हणतील ते सांगता येणार नाही. अशा कारणांमुळे ते आपले जीव मुठीत धरून आणि स्वतःला जरा जास्तच जपत एका अनामिक भीतीच्या छायेत जगत होते.  

कांही महिन्यांपूर्वी जेवढ्या प्रचंड उत्साहाने ते परदेशी जायला निघाले होते तो संपून गेला होता. यामुळे आता स्वदेशात परत जाण्याची वाट पहात ते दिवस मोजायला लागले.

आजीआजोबा आणि नातवंडे (भाग ४)

नोकरी किंवा व्यवसायानिमित्या परदेशांमध्ये जाऊन राहिलेल्या भारतीयांना 'अनिवासी भारतीय' (एनआरआय) असे म्हणतात. ते लोक कित्येक वर्षे तिकडेच राहिले तरीही 'भारतीय'च समजले जातात. अमेरिकेत रहात असलेल्या गौरवर्णीय, कृष्णवर्णीय आणि आजकाल वाढत चाललेल्या पीतवर्णीय लोकांपेक्षा ते लोकही स्वतःला वेगळे समजतात, इतरांच्यात फारसे मिसळत नाहीत. तिथे रहात असलेल्या भारतीयांना 'देसी' म्हंटले जाते आणि त्यांच्याशी थोडे अधिक सलोख्याचे संबंध ठेवले जातात.

एकाद्या कुटुंबातला मुलगा ज्या वेळी परदेशी जायला निघतो तेंव्हा ते सगळे कुटुंबच भावनाविवश होते. तिकडे गेल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्या मुलालाही मायभूमीची आणि तिथे रहात असलेल्या आपल्या आईवडिलांची, भावंडांची, मित्रांची आणि इतर आप्तांची सारखी आठवण येत असते. इकडे येऊन सर्वांना भेटायची आणि त्यांच्याशी भरभरून बोलायची तीव्र इच्छा त्याला होत असते. मिळेल ती संधी साधून तो वारंवार इकडे येऊन जातही असतो. कालांतराने हळूहळू त्याचे मन तिकडे रमायला लागते, एकेक दोन दोन वर्षे करत त्याचा तिकडचा मुक्काम लांबत जातो, त्याच्या कामाचा आणि संसाराचा व्याप वाढत जातो, तसतसा तो त्यात अधिकाधिक गुंतत जातो, तिकडचाच होत जातो, मग त्याचे भारतात येणे कमी होत जाते. काही मुलांचे भाऊबहीण, मित्र मैत्रिणी वगैरे आधीच परदेशात गेलेले असतात, पुढल्या काळात आणखी काहीजण परदेशगमन करतात आणि त्यांची संख्या वाढत जाते, त्याबरोबर त्या मुलांना वाटणारे भारतात येण्याचे आकर्षणही कमी होत जाते.

एकाद्या मुलाला काही वर्षांनी तिकडचे नागरिकत्व मिळाले तर तो त्याच्या आईवडिलांनाही कायमचे तिकडे घेऊन जाऊ शकतो. काही आईवडील यासाठी आनंदाने एका पायावर तयार होतात आणि संधी मिळताच इकडचा गाशा गुंडाळून मुलाकडे परदेशात रहायला चालले जातात. आपले उर्वरित आयुष्य पृथ्वीवरील नंदनवनात घालवून एक दिवस तिकडूनच स्वर्गलोकाला प्रयाण करतात. काही मुलांच्या आईवडिलांना त्यांच्या उतारवयात आर्थिक, शारीरिक, मानसिक वगैर सगळ्याच प्रकारच्या आधारांची अत्यंत गरज असते. आपला देश सोडून कायमचे परमुलुखात रहायला जाणे त्यांच्या मनाला पटत नसले तरी निरुपाय म्हणून तेही अनिच्छेने परदेशी जातात.

परदेशात रहायला जाईपर्यंत यातले बहुतेक लोक आजीआजोबा झालेले असतातच. त्यांना आपल्या मुलाच्या संगतीत आणि त्याच्या आधारावर राहण्याइतकेच नातवंडांच्या प्रेमळ सहवासाचे महत्व वाटत असते. पण त्यांची ही अपेक्षा पूर्ण होत असेल का? पाश्चात्य देशांमधल्या अनेक लोकांचे कौटुंबिक जीवन आज मोठ्या प्रमाणात उध्वस्त झालेले आहे. तिकडली कित्येक मुले सज्ञान होईपर्यंत त्यांचे आई आणि वडील एकमेकांपासून फारकत घेऊन वेगळ्याच जोडीदारांमसवेत किंवा एकट्याने निरनिराळ्या ठिकाणी रहात असतात. त्यातली काही मुले त्यांच्या आईसोबत, काही वडिलांबरोबर आणि काही आणखी कोणाच्या आधाराने रहात असतात. काही मुले अनाथ किंवा अनौरस असतात, ती सामाजिक सेवाभावी संस्थांच्या ताब्यात असतात. अशा प्रकारे यातल्या ज्या मुलांचा आपल्या सख्ख्या आईवडिलांशी संपर्क राहिलेला नसेल त्यांना त्यांच्याबद्दल काय वाटत असेल? आणि आजीआजोबा म्हणजे आईवडिलांच्या आईवडिलांबद्दल त्यांच्या मनात कितपत आदर किंवा प्रेमभावना वाटत असेल? त्यांना त्यांच्याबद्दल कितीशी माहिती असेल? आणि अशा मुलांच्या सहवासात वाढलेल्या 'देसी' नातवंडांवर त्यांच्या विचारांचा प्रभाव पडत असेलच ना? कदाचित असेही असू शकेल की इतर कोणाकडेही नसलेले 'ग्रँपा' आणि 'ग्रॅनी' आपल्याकडे असल्यामुळे आपण कोणी स्पेशल असल्याचा त्या मुलांना अभिमान वाटत असेल.  

मुलांकडे परदेशात कायमचे रहायला गेलेल्या आजीआजोबांची संख्या किंवा टक्केवारी सध्या तरी नगण्य म्हणण्याइतकी अगदी कमी आहे. अमेरिकेतल्या समाजातल्या लोकांचे सरासरी आयुर्मान वाढले असले तरी तिथले वृध्द क्वचितच त्यांच्या मुलाबाळांसोबत राहतात. ते स्वतंत्रपणे किंवा ओल्डएजहोम्समध्ये रहात असतात. त्यामुळे तिकडे स्थायिक झालेल्या सगळ्या भारतीयांनाही आपल्या आईवडिलांना आपल्याबरोबर रहायला आणावे असे वाटेलच असे नाही. अनेक लोक तसा प्रयत्न करतही नसतील. त्याचप्रमाणे भारतात संपूर्ण आयुष्य घालवल्यानंतर अखेरीस वेगळ्या देशातल्या वेगळ्या वातावरणात जायलाही बहुतेक लोक तयार होत नाहीत. काही जणांचा एकादा मुलगा किंवा मुलगी भारतातच असतात. त्यांना त्यांचा आधार असतो. काही लोक उतारवयातसुद्धा स्वतंत्रपणे मजेत राहू शकण्याइतके धट्टेकट्टे असतात, काही लोकांनी इतर काही व्यवस्था केलेली असते. काही लोक "ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान" किंवा "तुका म्हणे स्वस्थ रहावे, जे जे होईल ते ते पहावे" असे म्हणत काळ कंठत असतात.

चौथ्या आणि अखेरच्या उदाहरणातले आजीआजोबा भारतातच राहतात, पण त्यांची दोन्ही मुले परदेशात गेली आहेत. त्या दोघांचाही प्रेमविवाह झाला आहे. मुलीने बंगाली बाबू मोशाय निवडला आहे, तर मुलाची पत्नी मल्याळीभाषी केरळकन्या आहे. मुलगी आणि जावई दोघेही शास्त्रीय संशोधन करतात. आपापल्या क्षेत्रात जगात इतरत्र कोणकोणते संशोधन चालले आहे याचा अभ्यास करणे, स्वतःच्या संशोधनावर शोधनिबंध लिहिणे, त्यांना शास्त्रविषयक नियतकालिकांमध्ये (सायंटिफिक जर्नल्स) प्रसिद्ध करणे, त्यांचे पेटंट्स मिळवणे, अधिकाधिक सेमिनार्स, कॉन्फरन्सेस वगैरेंमध्ये जाऊन त्यात सहभाग घेणे हेच त्यांचे जीवन आहे. भरपूर नावलौकिक आणि पैसे कमवावेत आणि आपले राहणीमान शक्य तितक्या उच्च दर्जाचे ठेवावे असे त्यांना वाटते. मुलांना जन्म देणे, त्यांचे संगोपन करणे यामुळे त्यात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी 'डिंक (डबल इनकम नो किड्स) कपल' राहण्याचा निर्णय घेतला आहे.

आजीआजोबांच्या मुलाच्या वंशवेलीवर दोन फुले उमलली आहेत. अमेरिकेत जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाला आपोआप तिथले नागरिकत्व मिळते असा तिकडचा नियम आहे. कदाचित अन्य देशात आणि भारतातसुद्धा असे नियम असले तरी मला त्याची माहिती नाही. थोड्या काळासाठी अमेरिकेत गेलेले लोक सुद्धा आपल्या मुलांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळावे म्हणून त्यांनी तिथेच जन्माला यावे असा आग्रह धरतात. आपल्या या गोष्टीतल्या आजीआजोबांच्या पहिल्या नातवंडाच्या जन्माच्या वेळी त्यांना स्वतः तिकडे जाण्याची खूप इच्छा होती. त्यात पहिल्या नातवंडाला जन्मल्याबरोबर पाहणे तर होतेच, अशा नाजुक वेळी आपण आपल्या मुलासोबत असलेच पाहिजे, ते आपले कर्तव्य आहे असे त्यांना वाटत होते. अमेरिकेच्या व्हिसासाठी दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांच्या मते अत्यंत सबळ असलेले हे कारण त्यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले. पण तो घेणा-या अमेरिकन अधिका-याला मात्र ते पटले नाही. "आमच्या देशातली वैद्यकीय व्यवस्था सर्वोत्कृष्ट आहे, बाळबाळंतिणींची सर्वतोपरी काळजी घेण्यासाठी ती समर्थ असल्यामुळे असल्या सबबीवर बाहेरून कोणाला तिकडे येण्याची गरज नाही." असा शेरा मारून त्यांचा अर्ज फेटाळला गेला.

त्यांना व्हिसासाठी पुन्हा अर्ज करण्याची संधी एक वर्षानंतर मिळाली या वेळी मात्र "तुमच्या सुंदर देशातली अद्भूत स्थळे आणि तिथली अद्ययावत शहरे वगैरेंची शोभा पाहण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी आम्हाला तिकडे जायचे आहे." असे सांगितल्यावर त्यांना दहा वर्षांसाठी व्हिसा मिळाला, पण एका भेटीमध्ये फक्त सहा महिनेच राहण्याची परवानगी होती. त्यांनीही तिकडे सहा महिने राहण्याचा बेत आखला. मुलाकडे जाऊन पोचल्यानंतर नातीचे कौतुक, मुलाशी बोलणे आणि तिकडची घरे, घरातल्या विविध सोयी, उद्याने, रस्ते, इमारती, बाजार वगैरे पाहून थक्क होण्यात पहिले दोन आठवडे अगदी स्वर्गसुखात गेले. त्यानंतर नव्याची नवलाई ओसरू लागली आणि महिना दीड महिना संपेपर्यंत थोडा कंटाळा यायला सुरुवात झाली. हवेतला गारवा वाढू लागला आणि घराबाहेर पडणे कठीण होऊ लागले. चोवीस तास घरात बसून राहण्याची स्थानबद्धता जाचक वाटू लागली. आणखी महिनाभर मुलाकडे राहून झाल्यावर मुलीला भेटायला आणि थोडे दिवस तिच्याकडे रहायला गेले. पण ते दोघे तर आपापल्या विश्वात इतके मग्न झालेले असायचे की रोज त्यांची भेट घडणेसुद्धा दुरापास्त होत असे. यामुळे आजीआजोबांना जास्तच एकाकीपणा यायला लागला. वाढत जाणारी कडाक्याची थंडी सहन होत नसल्यामुळे दमाखोकला वगैरेंनी उचल खाल्ली, वारंवार अंग मोडून येऊन ठणकायला लागले. या शारीरिक यातना सहन करणे कठीण होत गेल्यामुळे आजीआजोबांनी आपला दौरा आवरता घेतला आणि तीन महिन्यांनंतरच ते मायदेशी परतले. यानंतर पुन्हा कधी अमेरिकेला जायचे असल्यास उन्हाळ्यातच असे त्यांनी ठरवले.

आजीआजोबा आणि नातवंडे (भाग ५)

एकदा अमेरिकेची वारी करून परत आल्यानंतर त्या आजीआजोबांना पुन्हा अमेरिकेला जायचा योग त्यानंतर जुळून आलाच नाही. त्यांच्या नातवाच्या जन्माच्या वेळेस नेमका कडक हिवाळा होता आणि त्यानंतर आलेल्या उन्हाळ्यात भारतातल्या जवळच्या आप्ताच्या मुलीचे लग्न असल्यामुळे त्यांना त्यातली महत्वाची आणि जबाबदारीची कामगिरी सोपवली गेली होती. त्यानंतरच्या वर्षी त्यांना प्रकृतिअस्वास्थ्यामुळे परदेशी जाता आले नाही. पुढल्या वर्षी त्यांच्या मुलालाच भारतात यायचे होते, म्हणून ते गेले नाहीत. पण मुलालाही इकडे येणे जमलेच नाही. त्याला कधी शहर तर कधी घर बदलायचे होते, कधी मुलांच्या शाळेच्या अॅड्मिशन घ्यायच्या होत्या, कधी वर्कपरमिटचे काम करून घ्यायचे होते, तर कधी ऑफिसमधून सुटी मिळू शकत नव्हती. अशा निरनिराळ्या कारणाने त्यांना दोन वर्षे येता आले नाही. अखेर सगळे प्रॉब्लेम सुटून त्यांचे येण्याचे नक्की ठरले आणि तिकीटे काढली गेली.

आजीआजोबांनी आपल्या मुलाच्या आणि नातवंडांच्या आगमनाच्या तारखेवर कॅलेंडरमध्ये ठळक अक्षरात खूण करून ठेवली आणि उरलेले दिवस मोजायला सुरुवात केली. आता ते त्यांच्या आगमनाच्या तयारीला लागले. घराची डागडुजी करून भिंतींना नवे रंग लावून घेतले. ते काम करून घेतांना बरीचशी जुनी अडगळ काढून टाकून मुलांच्या सामानासाठी जागा केली. त्यांच्यासाठी एक बेडरूम रिकामी करून ठेवली. तिथल्या कपाटांमधले सामान दुसरीकडे हलवले. त्या बेडरूमला एअर कंडीशनर बसवून घेतला. पहिल्या रेफ्रिजरेटरच्या दुप्पट आकाराचा मोठा रेफ्रिजरेटर घरात आणला, घरातल्या टीव्हीवर जगातले सगळे चॅनेल्स पाहण्याची व्यवस्था केली. काजू, बदाम, पिस्ते, बेदाणे वगैरे सुक्या मेव्याची पाकिटे आणून ठेवली. बेसनाचे लाडू, नारळाच्या वड्या, खमंग चकल्या, आळूवड्या वगैरे मुलाच्या आवडीचे पदार्थ तयार करून डब्यात भरून ठेवले. नातवंडांसाठी बाजारात मिळतील तेवढ्या प्रकारची चॉकलेट्स, बिस्किटे, कुकीज वगैरे आणून ठेवली. त्यांच्यासाठी छान छान खेळणी आणि कपडे आणले. त्या काळात आजीआजोबांच्या मनाला दुसरा कुठला विचारच शिवत नव्हता.

नातवंडांच्या आगमनाचा दिवस उजाडण्याच्या आधीपासूनच आजीआजोबांनी त्यांच्या विमानाचे स्टेटस इंटरनेटवर पहायला सुरुवात केली. तिकडून निघतांना मुलाने फोन केला होताच, त्यांचे विमान मुंबईच्या विमानतळावर पोचल्याचे इंटरनेटवर पाहताच आजीआजोबांनी सुस्कारा टाकला. पाठोपाठ त्यांच्या मुलाचा पोचल्याचा फोनही आलाच. आता बाल्कनीत उभे राहून दोघेही टॅक्सीच्या येण्याची वाट पहायला लागले. गेटपाशी एक टॅक्सी आलेली दिसताच त्यातून कोण कोण उतरत आहे हे पाहिले. आजींनी आत जाऊन आरतीचे तबक तयार करून आणले. तोपर्यंत सगळेजण दारापर्यंत येऊन पोचलेच होते. आधी तर नातवंडांनी दुडूदुडू धावत पुढे येऊन दरवाजा ठोठावला, पण तो उघडल्यावर मात्र मागे सरून ते त्यांच्या आईवडिलांच्या मागे दडून उभे राहिले. भाकरीचा तुकडा त्यांच्यावरून ओवाळून टाकल्यानंतर आणि औक्षण करून झाल्यावर सर्वांनी घरात प्रवेश केला.

नातवंडे आधी थोडी बिचकत होती, पण थोड्याच वेळात नव्या जागेत रुळली. घरभर हिंडून इकडच्या वस्तू तिकडे करू लागली, त्यांची उलथापालथ करू लागली. शोकेसमधल्या शोभेच्या वस्तू बाहेर काढून त्यांच्याशी खेळू लागली. ते करत असतांना त्यांच्या चेहे-यावर ओसंडून वाहणारा आनंद निव्वळ अपूर्व होता. हर्षोल्लासातून आणि एका प्रकारच्या विजयोन्मादातून त्यांनी काढलेले चित्कार खूप गोड वाटत होते. हेच पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आजीआजोबांनी किती वर्षे अधीरतेने वाट पाहिली होती. त्याचे सार्थक झाले होते. आधी तर आजीआजोबांना त्यांच्या उत्साहाचे आणि अॅक्टिव्हपणाचे अमाप कौतुक वाटले, पण ते पाहून त्या मुलांना अधिकच चेव चढला. त्यांचा धागडधिंगा जरा अतीच होऊ लागल्यावर त्याला आळा घालणे आवश्यक होते. मोठी मुलगी जरासे दटावल्यावर थांबली, पण लहानगा तर काहीही समजून घेण्याच्या वयाचा नव्हताच. त्यामुळे कोणतीही नाजुक किंवा धोकादायक वस्तू त्याच्या हाताला लागू न देणे एवढाच उपाय होता. अशा सगळ्या वस्तू भराभर उचलून उंचावर किंवा कडीकुलुपात बंद करून ठेवाव्या लागल्या. तरीही काही वस्तूंची मोडतोड झालीच. शिवाय उचलून ठेवलेल्या वस्तूच हव्या म्हणून थोडी रडारडही झाली.

मुलांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी त्यांना टेलिव्हिजन लावून दिला. अर्थातच त्यांच्या आवडीची कार्टून्स दाखवणारी चॅनेल्स पाहण्याचा हट्ट त्यांनी धरला. रिमोट कंट्रोलने ते चॅनेल्स लावणे समजायला त्यांना काहीच वेळ लागला नाही. त्यानंतर दिवसाचा बहुतेक वेळ घरातल्या एकमेव टीव्हीवर पोगो, निक, सीबीबी, डिस्ने ज्युनियर वगैरे किड्स चॅनेल्सच लागलेले असत. कोणीच ते लक्ष देऊन पहात नसले तरी बॅकग्राऊंडवर ते चालत असणे आवश्यक बनले. माई, नाना, आईआजी, भाबो वगैरे आजीआजोबांच्या रोजच्या पाहण्यातली मंडळी आता त्यांना भेटेनाशी झाली. टीव्हीवर ताबा मिळवल्यानंतर मुलांनी घरातल्या टॅब्लेट आणि सेलफोन्सकडे मोर्चा वळवला आणि त्यावर असलेले गेम्स खेळायला लागले. आजकाल सगळ्या गोष्टी इतक्या यूजर फ्रेंडली झाल्या आहेत की अक्षरओळख नसलेली मुलेसुद्धा आयकॉन्सवर आपली चिमुकली बोटे दाबून सटासट खेळ सुरू करून खेळत बसतात किंवा मेमरीत साठवून ठेवलेली चित्रे आणि चलचित्रे पहात बसतात. त्यांचा सगळा वेळ यातच जात असल्यामुळे त्यांचे आजीआजोबांच्या शेजारी बसणे फारसे झालेच नाही.

खास मुलांसाठी तयार केलेल्या पाचक आणि पौष्टिक द्रव्यांच्या पिठांचे खूपसे डबे त्यांच्या आईने अमेरिकेतून येतांना आणले होते. दिवसातल्या ठराविक वेळी त्यातल्या ठराविक पॉवडरचे १-२ चमचे उकळलेल्या पाण्यात किंवा दुधात मिसळून ती त्यांना खायला किंवा प्यायला देत होती. डाळ, तांदूळ वगैरे शिजवून आणि गाजर, टोमॅटो, दुधी वगैरेंना वाफवून ते पदार्थही घड्याळाच्या ठोक्याप्रमाणे त्यांना खायला घालत होती. भारतातले अरबट चरबट काही खाऊन त्यांची पोटे बिघडू नयेत किंवा त्यांना कसल्याही संसर्गाची बाधा होऊ नये यासाठी ही दक्षता घेतली जात होती. आपल्या नातवंडांसाठी मुगाच्या डाळीची ऊनऊन खिचडी किंवा शेवयाची खीर करून त्यांना आपल्या हाताने भरवावी असे आजीच्या मनात आले तरी ते प्रत्यक्षात आणायला वावच नव्हता. 

अमेरिकेत असतांना दोन्ही मुलांच्या कानावर कधी एकाददुसरा मराठी शब्द पडला असला तर असेल, त्याचा अर्थ थोडासा समजलाही असेल, पण त्यांच्या बोलण्यात तो येत नव्हता. मोठी मुलगी इंग्रजीत काही सोपी वाक्ये बोलायची. पण तिच्या अमेरिकन अॅक्सेंटमुळे तिचे बोलणे समजून घेणे आणि तिच्या भाषेत तिला समजेल असे काही सांगणे आजीआजोबांना अवघड जात होते. लहान मुलाचे इंग्रजीतले बोबडे बोल कळणे तर अशक्यप्रायच होते. त्यामुळे आजीआजोबांना त्यांच्या नातवंडांशी संवाद साधता येत नव्हता. त्यांना मांडीवर बसवून काऊचिऊच्या गोष्टी सांगणे दूरच, सिंड्रेला किंवा स्नोव्हइटची गोष्ट सांगणेसुद्धा अशक्य होते.    

अमेरिकेतून आलेल्या मंडळींचा भारतातला कार्यक्रम चांगलाच धावपळीचा होता. अमेरिकन वकीलातीत जाऊन व्हिसाचे स्टँपिंग करून घेणे अत्यावश्यक होते. त्याची पूर्वतयारी करण्यात आणि वकीलातीच्या चकरा मारण्यात काही दिवस गेले. भारतातले इतर नातेवाईक, मित्रमैत्रिणी वगैरेंना भेटण्यात काही दिवस गेले, त्यासाठी दोन तीन वेळा परगावी जाऊन येणेही झाले. सुनेला तिच्या माहेरी काही दिवस रहाण्यासाठी आणि तिच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी केरळ कर्नाटकाची वारी करून झाली. त्या गडबडीतच भारतातली एक दोन पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे वगैरेंना भेटी देऊन झाल्या. हे करता करता अमेरिकेला परतायचा दिवसही उजाडला. यात आजीआजोबांना त्यांच्या नातवंडांसमवेत अगदी मोजके दिवसच घालवायला मिळाले. त्यातला क्षण न् क्षण सार्थकी लावण्याचा यथाशक्ती प्रयत्न त्यांनी केला.

"आता पुढल्या वर्षी तुम्ही दोघे अमेरिकेला या." आणि "आम्ही आमची पुढची ट्रिप नक्की लवकरात लवकर करू." वगैरे मुलाने घरातून निघतांना आपल्या आईवडिलांना सांगितले. नातवंडांना निरोप देतांना आजीआजोबांचे डोळे भरून आले. त्या दोघांना आता पुन्हा याच रूपात त्यांना पहायला मिळणार नव्हते. पुढच्या भेटीपर्यंत ते दोघेही किती तरी बदललेले असणार, याची जाणीव झाल्याने ते त्यांना डोळे भरून पाहून घेत होते, पण अश्रूंमुळे ते अंधुक दिसत होते.  मुले मात्र आता परत जाणार म्हणून खूष होती. आजीआजोबांच्या लहानपणी त्यांच्या आजीआजोबांना सोडून जातांना ते त्यांच्या गळ्य़ात पडून रडायचे याची त्यांना आठवण झाली, पण त्यांच्या नातवंडांनी मात्र  आनंदाने हात हलवून बाय बाय केले. त्यांची ही हंसरी छबीच लक्षात ठेवली गेली हे ही एका परीने चांगलेच झाले. नातवंडांच्या चार दिवसांच्या अत्यल्प सहवासानेसुद्धा आजीआजोबांना एक अपूर्व असा आनंद मिळवून दिलाच, पण त्यांचे येणे आणि जाणे त्यांना एकाद्या लहानशा वावटळीसारखे वाटले. त्याने सुखद गारवा आणला, पण घरट्याच्या काही काड्या किंचित विस्कटल्या. त्यांना पुन्हा जुळवून घ्यायच्या की तशाच राहू द्यायच्या हे त्यांना सुचत नव्हते.

गेल्या शतकात मध्यमवर्गीयांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले. पूर्वीच्या काळातले लोक खेड्यापाड्यांमध्ये एकत्र कुटुंबामध्ये रहात असत. त्यांच्या पिढ्या न् पिढ्या एकाच चाकोरीत रहात असल्यामुळे दोन पिढयांमधल्या माणसांच्या आचारविचारात फरक नसायचा. कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे आजीआजोबांचे स्थान कुटुंबप्रमुखाचे असायचे. नातवंडांशी त्यांचा अत्यंत निकटचा संबंध येत असल्याने त्यांच्यात अतिशय जिव्हाळ्याचे घट्ट नाते निर्माण होत असे. मधल्या पिढीतले बरेचसे लोक उदरनिर्वाहासाठी मुंबईपुण्यासारख्या शहरात येऊन स्थायिक झाले, पण नेहमी आपल्या गावी जाऊन येत असत. त्यांच्या मुलांना अधून मधून त्यांच्या आजीआजोबांचा सहवास मिळत असे. त्या मुलांच्या मनात आजीआजोबांचे एक विशेष स्थान निर्माण होत असे, त्यांचेविषयी ओढ वाटत असे. ती मुले मोठी झाल्यानंतर त्यांच्यातली काही आपल्या शहरातच राहिली, पण त्यांच्यात आणि त्यांच्या आईवडिलांच्यात जनरेशन गॅपमुळे थोडा दुरावा निर्माण झाला, त्यातली काही वेगळी रहायला लागली. त्यांच्या मुलांचे आजीआजोबांबरोबरचे संबंधही त्यामुळे कमकुवत होत गेले. अनेक मुले दिल्ली, बंगलोर किंवा लंडन, न्यूयॉर्क, सिडनी या सारख्या दूर दूरच्या ठिकाणी गेली. त्यांच्या मुलांची आजीआजोबांशी फारशी ओळखच होऊ शकली नाही. ती आणखीनच दुरावत गेली. विज्ञान तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे आता जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या लोकांशी घरबसल्या संपर्क साधणे शक्य झाले आहे खरे, पण व्यक्तिशः गाठभेट झाली नसेल तर पडद्यावर दिसणारे गोष्टीतले आजीआजोबा आणि पडद्यावरच दिसणारे आपले खरेखुरे आजीआजोबा यात लहान बालकांना कितीसा फरक वाटणार आहे? प्रत्यक्ष भेटण्याला आणि सहवासाला पर्याय नाही हेच खरे. नाती जपून ठेवायची असल्यास त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.


 . . . . .  . . . . . . . . .  . . . . . . . . . . . . .  (समाप्त)

Tuesday, May 20, 2014

काकतालीय, कावळा आणि कलहंस

एकाद्या झाडाच्या एकाद्या फांदीवर एक कावळा बसला आणि लगेच ती फांदी कट्कन मोडून गेली. एवढ्या दोनच घटनांचा एकत्र विचार केला तर त्यात एक कार्यकारणभाव दिसतो. फांदीवर एक कावळा बसला हे कारण आणि त्यामुळे फांदी मोडून गेली हे कार्य. पण जगातल्या असंख्य झाडांवर अनंत कावळे नुसते बसत नाहीत तर घरटी करून राहतात आणि त्यांचा सगळा भार त्या फांद्या सहजपणे सहन करत असतात हे सर्वांनीच अनेक वेळा पाहिलेले असते. त्यामुळे "एका कावळ्याच्या बसण्यामुळे झाडाची फांदी मोडेल" असे कोणताही शहाणा माणूस म्हणणार नाही. बहुतेक सगळ्या झाडांची पाने, फुले सुकून गळत असतात, त्याचप्रमाणे काही जुन्या लहान फांद्याही दुबळ्या होऊन कुठल्या कावळ्याचा स्पर्शही झाला नसतांनासुद्धा आपल्या आपच तुटून पडत असतात. अशा जर्जर झालेल्या फांदीवर कावळ्याचे बसणे आणि तिचे तुटून पडणे या दोन्ही गोष्टी एकत्र घडल्या तर मात्र कावळ्याचे त्या फांदीवर बसणे हे मोडण्याचे एक निमित्य ठरते. 'कावळा बसायला आणि फांदी मोडायला गाठ पडणे' या म्हणीमधून अशा प्रकारचा योगायोग दाखवला जातो. या योगायोगाला संस्कृतमध्ये 'काकतालीय न्याय' असे नाव दिले गेले आहे. त्यात एवढाच फरक आहे की कावळ्याच्या झाडावर बसण्यानंतर त्याची फांदी तुटण्याऐवजी त्याने तालवृक्षावर बसताच त्या वृक्षाचे फळ गळून खाली पडते. यातसुद्धा दोन स्वतंत्र घटना एकाच वेळी घडत असल्यामुळे त्यांच्या दरम्यान एक आभासी (खोटा) कार्यकारणभाव दिसतो.

एकाद्या दिवशी प्रत्यक्ष कावळ्यांच्याच बाबतीत अशा प्रकारच्या भिन्न घटना योगायोगाने घडत गेल्या तर त्याला काय म्हणावे? मागच्या महिन्यात एकदा मला याचाच अनुभव आला. अलीकडे मी चेपू(फेसबुक)वर रोज एक संस्कृत सुभाषित देण्याचा सपाटा लावला होता. त्यात एकदा मी खालील सुभाषित दिले होते.
काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेद पिककाकयोः।
वसंतसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः ।।
याची अर्थ असा आहे. कावळाही काळा असतो आणि कोकिळही काळा, मग दोघांमध्ये फरक तो काय? दोघेही सारखेच. पण कोणता कावळा आहे आणि कोणता कोकिळ? हे वसंत ऋतू आला की आपोआप त्यांच्या आवाजावरून समजते. कावळा "काव काव" करत राहतो आणि कोकिळ किंवा कोकिळा मात्र "कुहू कुहू" गायला लागतात. याचा खरा अर्थ असा आहे की कोणाच्याही फक्त बाह्य रूपावर जाऊ नये, प्रत्येकाच्या अंगातले सुप्त गुण वेगळे असतात. वेळ आल्यावर ते समजतात. कावळ्याच्या बाबतीत पहायला गेल्यास तो दिसायलाही काळा आणि कुरूप आणि त्याचा आवाजही कर्कश असतो, पण कोकिळा मात्र काळी सावळी दिसत असली तरी वसंत ऋतू आला की अत्यंत सुरेल आवाजात गाऊ लागते. इतर ऋतूंमध्ये ती कशा प्रकारचा आवाज काढते की मौनव्रत धरते कोण जाणे!

खरे सांगायचे झाल्यास कावळा, कावळीण, कोकिळ, कोकिळा वगैरे पक्ष्यांच्या बाह्य रूपातला फरक मलासुद्धा फारसा समजत नाही. मला तरी ते सगळेजण एकजात काळे कुळकुळीत दिसतात. दुर्बीण घेऊन पक्ष्यांचे निरीक्षण करणारे पक्षीप्रेमीच कदाचित त्यांना ओळखू शकत असतील. "त्यांच्या आवाजावरून त्यांना ओळखणे सोपे आहे" असे सुभाषितकार म्हणतात. पण एकाच झाडावर कावळे आणि कोकिळा एकत्र किंवा समोरासमोर जमलेले आहेत. त्यातल्या कावळ्यांच्या कर्कश कलकलाटाला वैतागून गेलेले कोकिळपक्षी कुहू कुहू करून त्यांची समजूत घालत आहेत. अशा प्रकारची जुगलबंदीची मैफिल जमलेली आहे असे दृष्य पाहण्याची संधी मला तरी कधीच मिळाली नाही. त्यामुळे पक्ष्यांचे आवाज ऐकून त्यांच्यातला "हा कावळा" आणि "हा कोकिळ" असा भेदही मला तरी करता आला नाही.

जेंव्हा मी हे सुभाषित फेसबुकावर दिले होते त्या काळात वसंत ऋतू सुरू होता, अधून मधून दुरून कुठून तरी कोकिळेची "कुहू कुहू" अशी साद ऐकू येत होती, पण तो मंजूळ ध्वनि नेमका कुठून येत आहे हे समजत नव्हते. सहजासहजी त्याचा वेध घेता येत नव्हता आणि त्यामुळे झाडावरच्या पानात लपून गाणा-या कोकिळाचे प्रत्यक्ष दर्शन होत नव्हते. आमच्या भागात कावळ्यांची संख्या मात्र भरपूर आहे. आमच्या घराच्या आसपासच कुठे तरी त्यांची रोज सकाळसंध्याकाळची शाळा भरते आणि त्यांची कर्कश कावकाव सारखी कानावर पडत असते. आमच्या गॅलरीत किंवा खिडकीत येऊन आशाळभूतपणे घरात डोकावणारा आणि एकादा खाद्यपदार्थ दिसला रे दिसला की झपाट्याने त्यावर धाड घालून अन्नात चोच खुपसणारा द्वाड पक्षी हा कावळाच असणार यात शंका नाही. आमच्या घरात संगीताचे सूर अनेक वेळा घुमत असले तरी त्याने आकृष्ट होऊन एकादा कोकिळपक्षी खिडकीत येऊन बसला आणि त्याने वरचा षड्ज लावला असे मात्र आजतागायत कधीसुद्धा घडलेले नाही.

कुठल्याही कोकिळेचे आमच्याकडे लक्ष नसावेच, पण कावळ्यांची तीक्ष्ण नजर मात्र आमच्या घरावर असायची. मी आंतर्जालावर चढवलेला मजकूरसुद्धा त्यांना माय 'क्रो' वेव्हजमधून परस्पर समजत असतो की काय अशी शंका यावी असे त्या रात्री घडले. झोपण्यापूर्वी मी तो श्लोक फेसबुकावर दिला आणि भल्या पहाटेच्या सुमारास आमच्या घरापाशी कावळ्यांचा प्रचंड कलकलाट झाला. त्यांच्या कर्कश ओरडण्याचा मोठा आवाज ऐकून आमच्या गृहमंत्री झोपेतून जाग्या झाल्या आणि त्यांनी समस्त काकजातीवर चरफडत घराच्या सगळ्या खिडक्या फटाफट लावून घेतल्या. बाहेरून येणारा गोंगाटाचा आवाज थोडा कमी झाला तरी उडालेली झोप परत येण्याचे नाव घेत नव्हती. त्यामुळे घरातले अंतर्गत ध्वनिप्रदूषण होतच राहिले. आदल्या रात्री झोपण्यापूर्वी मी कावळ्यांबद्दल थोडे वाईटसाइट लिहिले होते त्याचा सगळ्या कावळेवर्गाकडून अशा प्रकारे जाहीर निषेध चालला असेल अशी एक शंका माझ्या मनाला चाटून गेली. मी काही ती बोलून मात्र दाखवली नाही.

कालांतराने उजाडल्यावर मी रोजच्या संवयीप्रमाणे उठून फिरायला गेलो. परत घरी येऊन बाल्कनीत उभा राहिलो आणि समोरचे दृष्य पाहून आश्चर्याने थक्क झालो. आमच्या बाल्कनीच्या बरोबर समोरच्या रस्त्याच्या मधोमध पण हवेतल्या हवेतच अधांतरी होऊन एक कावळा जागच्या जागी तडफडतो आहे असे दिसत होते. तो आपले पंख जरासे फडफडायचा, पण त्यामुळे हवेत वर उडत नव्हता किंवा बाजूलाही जात नव्हता. आणि गुरुत्वाकर्षणाने खाली जमीनीवरही पडत नव्हता. तो मधल्यामध्येच कशात तरी अडकलेला होता हे निश्चित होते, पण कशात हे समजत नव्हते. आमच्या घरात येणारी वीज जमीनीखालून घातलेल्या केबल्समधून येते आणि टेलीफोनच्या तारासुद्धा जमीनीखालूनच घातल्या आहेत. टेलिव्हिजन आणि इंटरनेट कनेक्शन्सच्या काही वायरी आहेत त्या चार मजले उंचीवरून जोडलेल्या आहेत. आणि हा कावळा मात्र जेमतेम दुस-या मजल्याच्या उंचीवर जागच्या जागी हवेत तरंगत होता.

खाली रस्त्यावर जाऊन जवळून पाहिल्यावर असे लक्षात आले की तो कावळा एका पतंगाच्या मांज्यात अडकून तडफडत होता, तो मांजा इतका बारीक होता की डोळ्यांना सहज दिसतही नव्हता, पण तो अतीशय मजबूत असावा. आमच्या घरासमोरील रस्त्यावर दोन्ही बाजूंना लावलेल्या झाडांच्या फांद्यांमध्ये हा मांजा अडकलेला होता आणि कावळ्याचे पंख त्याच्यात अडकले होते. आम्हाला ते दृष्य पाहवतही नव्हते आणि आपण नेमके काय करावे, फायर ब्रिगेडला कसे बोलवावे वगैरे सुचतही नव्हते. रस्त्यावरून जात असलेल्या एका मुलाने जवळच्या झाडावर चढायचा प्रयत्नही करून पाहिला पण तो त्या मांज्य़ापर्यंत पोचू शकला नाही. सुदैवाने शेजारच्या इमारतीची दुरुस्ती चालली होती. त्यासाठी काही बांबूंचे स्कॅफोल्डिंग बांधले होते, एक दोन बांबू खाली पडले होते. एका माणसाने प्रसंगावधान राखून त्यातला एक बांबू आणला आणि त्याने हलवून मांज्याला जोरात धक्के देताच कावळ्याची (आणि आमची) सुटका झाली.

हा कावळा कदाचित पहाटेच्या अंधारात त्या मांजामध्ये अडकला असेल आणि त्याचे विव्हळणे ऐकून इतर कावळे तिथे जमले असावेत आणि ते सुद्धा ओरडू लागले असावेत. त्यांच्या कलकलाटाने आमची झोपमोड झाली होती. पण त्या वेळी त्याचे कारण समजले नव्हते. किंबहुना त्याला काही कारण असू शकेल असा विचारही त्या वेळी मनात आला नव्हता. अर्धापाऊण तासभरानंतर ते सगळे कंटाळून इकडे तिकडे उडून गेले होते आणि मांजात अडकलेला एकटा कावळा दमून भागून दीनवाणे थोडासा रडत होता. आपण सर्वांनी चतुर कावळ्याची गोष्ट वाचलेली असते. मडक्यातले पाणी चोचीत येत नाही असे पाहून तो त्यात दगड आणून टाकतो आणि त्यामुळे पाण्याची पातळी वर येताच ते पिऊन घेतो. मी पाहिलेल्या या सत्यकथेतले कावळे मात्र असे चतुर नव्हते. त्यांनी जर एकजुटीने तो मांजा चोचीने तोडायचा किंवा चोचीत धरून हलवायचा प्रयत्न केला असता तर कदाचित ते आपल्या बांधवाची सुटका करू शकलेही असते. पण आरडाओऱडा करण्यापलीकडे त्यांनी आणखी काही केलेले दिसले नाही. जी काही दहा पंधरा मिनिटे मी हे दृष्य पहात होतो त्या वेळात दुसरा कोणताही कावळा त्या बाजूला फिरकलासुद्धा नाही. बहुधा ते सगळे भयभीत झाले असावेत. 

यावरून एक जुनी अजरामर रचना आठवते.
कलकल कलहंसे फार केला सुटाया । फडफड निजपक्षी दाविलीही उडाया ॥
नृपतिस मणिबंधी टोचिता होय चंचू । धरिल दृढ जया त्या काय सोडील पंचू?
तदितर खग भेणे वेगळाले पळाले । उपवन-जल-केली जे कराया मिळाले ॥
सजण गवसला जो याचपासी वसे तो। कठिण समय येता कोण कामास येतो ! ॥

कलहंस असो किंवा कावळा असो (किंवा मनुष्यप्राणी), सगळे 'फेअर वेदर फ्रेंड्स' असतात हेच खरे.