Monday, September 27, 2010

यंदाच्या गणेशोत्सवातील आगळेपण



"नेमेचि येतो बघ पावसाळा । हे पृथ्वीचे कौतुक जाण बाळा ।।" या उक्तीमुळे तो दरवर्षी येतो आणि त्यातच गणेशोत्सवसुध्दा आपली हजेरी लावतो. हे सगळे ठरल्याप्रमाणे घडत असते आणि ते का घडते हे सुध्दा आता बहुतेक लोकांना माहीत झाले असल्यामुळे यात कौतुक करण्यासारखे कोणालाच काहीच दिसत नाही. त्या उत्सवातल्या मूर्ती, सजावट, गर्दी, उत्साह, भक्तीभाव, गजर, गोंगाट, रस्त्यातले अडथळे, वाहतूकीचे नियमन, सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन, स्पर्धा, बक्षिससमारंभ, पुढारी आणि नटनट्यांचे गणपतीसोबत काढलेले फोटो, लोकमान्य टिळक आणि त्यांची उद्दिष्टे, पर्यावरण, त्याचा -हास आणि त्याचे दुष्परिणाम, विसर्जनातली सुसूत्रता तसेच त्यातले अपघात वगैरे वगैरे वगैरे सगळेच विषय आता इतके नेहमीचे झाले आहेत आणि त्यावर इतके चर्वितचर्वण होऊन गेले आहे की त्यासंबंधीच्या बातम्या आणि लेख पाहून त्या न वाचताच वर्तमानपत्राचे पान उलटले जाते. या विषयांवर मीसुध्दा पूर्वी बरेच वेळा लिहिले आहे. त्यात आणखी भर टाकली तर हे पानसुध्दा वाचले न जाण्याची शक्यता वाटते. यामुळे या वर्षी थोडा वेगळा प्रयत्न केला आहे. उत्सवाच्या तयारीवरील एक मजेदार अल्पकथा मागच्या भागात दिली होती. या वेळी एक वेगळा विषय हातात घेतला आहे.

आजकाल सगळ्याच क्षेत्रात नेहमी चढाओढ चाललेली असते आणि रोजच कोणी ना कोणी कसला ना कसला विक्रम मोडून नवा उच्चांक प्रस्थापित करत असतो. तसेच चाकोरीबाहेरचे काहीतरी वेगळे करून दाखवत असतो. गणेशोत्सव वर्षाकाठी एकदा येत असल्यामुळे त्यातसुध्दा दरवर्षी कोणी ना कोणी काही तरी वेगळे करत असतो. यंदाचे नाविन्यवीर कोण आहेत ते थोडक्यात पाहू.

लालबागचा राजा दरवर्षीच अतिशय प्रखर अशा प्रकाशझोकात असतो. तिथल्या उत्सवाच्या पूर्वतयारीपासून त्याच्या खोल सागरात केल्या जाणा-या विसर्जनापर्यंत खडान् खडा बातमी वाचायला आणि ऐकायला मिळत असते. त्याचे दर्शन घेण्यासाठी येणा-या भक्तांची संख्या आणि त्यांनी उदारपणे केलेले दान याची मोजदाद होत असते आणि तो आकडा वाढत असतो. तरीसुध्दा यंदा त्यात नाविन्याचा भागही दिसला. दर्शनोत्सुक भक्तांचे कष्ट कमी करण्याच्या दृष्टीने या वर्षी त्यांच्यासाठी वातानुकूलित मंडप उभारला होता. तसेच त्यांना खाद्यपेयेसुध्दा पुरवली जात होती. देवदर्शनासाठी केलेल्या कष्टाच्या प्रमाणात पुण्यप्राप्ती होते असा काही लोकांचा समज आहे. घरात गाडी असतांनासुध्दा अन्नपाणी वर्ज्य करून उपाशीपोटी दहा दहा किलोमीटर पायपीट करून देवदर्शनाला जाणारे महानुभाव मी पाहिले आहेत. त्यांना कदाचित हे आवडले नसेल, तसेच या सगळ्या खर्चातून समाजाचा किंवा देशाचा काय फायदा झाला असा प्रश्न मूलगामी विचारून हा सगळा आटापिटा अनाठायी आहे असा सूर अश्रध्द लोकांनी लावला असेल. तसेच एवढ्या पैशात किती लोकांना पोटभर अन्न, अंगभर कपडे मिळाले असते, किती मुले शाळेला जाऊ शकली असती वगैरेंचे आकडेदेखील देतील.

गौडसारस्वतब्राह्मण म्हणजेच जीएसबी समाजाचा गणपती अत्यंत श्रीमंत समजला जातो. त्याचे सिंहासन, अंगावर चढवलेले दागदागीने आणि मुकुट वगैरे सरळ्याच गोष्टी सोन्याने बनवलेल्या आणि रत्नजडित असतात. हे ऐश्वर्य पहाण्यासाठी भाविक तसेच उत्सुक लोक दूरदूरहून येतात. कोट्यवधी रुपये किंमतीच्या या दौलतीचा कायमचाच विमा उतरवलेला असतोच. या वर्षी तिथे येणा-या प्रेक्षकांचासुध्दा विमा उतरवला होता म्हणे. विघ्नहर्ता गणपती सर्वांचे रक्षण करेलच. तरीही जर काही अनुचित घटना घडली तर त्यात हताहत होणा-या प्रेक्षकांना त्याची भरपाई करून मिळणार होती. सुदैवाने तशी वेळ आली नाही.

परंपरेनुसार गणेशाची मूर्ती शाडू मातीची असायची. यांत्रिकीकरण झाल्यानंतर प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा प्रामुख्याने वापर होऊ लागला. पर्यावरणवाद्यांच्या आग्रहाखातच पुन्हा एकदा शाडूमातीकडे ओघ वळू लागला आहे. काही लोक मूर्ती ठेवतच नाहीत, चित्राची पूजा करतात. काही लोक कायम स्वरूपाची मूर्ती ठेवतात, तिचे विसर्जन करत नाहीत. काही कल्पक लोक वेगळ्याच पदार्थांपासून गणेशाची मूर्ती तयार करतात. नारळांच्या ढिगातून गजाननाचा आकार तयार केलेला मी पूर्वी पाहिला आहे. यंदा काही निराळे प्रकार केले गेले. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला असे लहान मुलांचे स्वप्न असते. ६०० चॉकलेटे आणि २०००० बिस्किटे यांचा वापर करून एक गणपतीची मूर्ती या वर्षी तयार केली गेली होती, तर दुस-या एका जागी गणपतीच्या सर्वांगावर टूटाफ्रूटीचे तुकडे चिकटवले होते. अर्थातच यातला एकादा तुकडा जरी कोणी तोंडात टाकला तो गणपतीभक्षक ठरेल. यामुळे कोणीही असे करणार नाही. या मूर्तींचे विसर्जन कुठे केले आणि त्या जलाशयातील जलचर प्राण्यांना मेजवानी मिळाली की प्रदूषणाने जिवाला मुकावे लागले ते कांही समजले नाही.

ओरिसाच्या समुद्रकिना-यावर वाळूची शिल्पे बांधणा-या कलाकरांना जगभर प्रसिध्दी मिळाली आहे. एका जागी असा वालुकामय गणपती तयार केला गेला. एका कलाकाराने १२ लक्ष साबूदाणे घेतले, त्यांना वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगवून त्यांचा उपयोग केला आणि त्यातून अप्रतिम सुंदर रांगोळी सजवली. या प्रत्नाची गिनेस बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे.

Thursday, September 16, 2010

गणेशोत्सवातली उणीव

संदीप आणि संपदा या दोघांनाही आनंदोत्सवांची खूप हौस होती. दरवर्षी ते मोठ्या हौसेने आणि भक्तीभावाने आपल्या घरातला गणेशोत्सव साजरा करायचे. एकदा ऐन श्रावण महिन्याच्या अखेरीस संपदाला एक अपघात झाला आणि पायाला प्लॅस्टर घालावे लागल्यामुळे झोपून रहाणे भाग पडले. ऑफीसातून महिनाभर सुटी काढून संदीप घरी राहिला. संपदाच्या तबेतीबद्दल काही चिंताजनक नसल्याने आणि मुलांच्या हौसेसाठी त्यांनी दरवर्षीप्रमाणेच गणेशोत्सव साजरा करायचे ठरवले.

संदीपला सगळीच कामे व्यवस्थित नियोजनपूर्वक करायची संवय होती. त्याने गणेशोत्सवासाठी एक वही उघडली आणि वेगवेगळ्या पानांवर पूजेचे सामान, सजावटीच्या वस्तू, खाद्यपेये वगैरे सर्व गोष्टींच्या तपशीलवार याद्या लिहून काढल्या. तसेच गणपती बसवायला रिकामी जागा करण्यासाठी घरात कोणते बदल करायचे, कोणते सामान कोठे हलवायचे, या कालावधीत काय काय करायचे, काय काय करायचे नाही वगैरे सगळ्या गोष्टींच्या नोंदी करून ठेवल्या. त्यातले कांही स्वतः लिहिले, काही संपदाने सांगितल्या, काही मुलांनी सुचवल्या. वहीत पाहून त्याने सगळ्या वस्तू बाजारातून आणल्याच, शिवाय आयत्या वेळी समोर दिसल्या, आवडल्या, मुलांनी मागितल्या वगैरे कारणांनी चार जास्तच वस्तू आणल्या.

दरवर्षी संदीपला गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी ऑफिसातून आल्यानंतर रात्री जागून गणपतीची जमेल तेवढी सजावट करावी लागत असे आणि नंतर रोज सकाळी लवकर उठून ऑफीसला जायच्या आधी घाईघाईने पूजा आटपावी लागत असे. त्या वर्षी दिवसभर घरीच असल्यामुळे त्याने दोन तीन दिवस राबून छानशी सजावट केली. त्याला हौसही होती आणि त्याच्या हातात कसबही होते. घरगुती गणेशोत्सवांच्या स्पर्धेत भाग घेऊन बक्षिस मिळवण्याइतका चांगला देखावा त्याने उभा केला. ऑफिसला जायचे नसल्यामुळे तो रोज सकाळी गणपतीची शोडषोपचार पूजा करून अथर्वशीर्षाची आवर्तने करू शकत होता. शेजारच्या स्वीटमार्टमधून रोज नवनवी पक्वान्ने आणून तो त्यांचा नैवेद्य दाखवत होता. त्यामुळे बाप्पांची आणि मुलांची चंगळ झाली. संध्याकाळची आरती वेळेवर होत होती. संदीपने भरपूर मिठाया आणि नमकीन पदार्थ आणि ते वाढून देण्यासाठी पेपर प्लेट्स आणि ग्लासेस आणून ठेवले होते. आल्यागेल्या प्रत्येकाला तो तत्परतेने प्लेटमध्ये खाद्यपदार्थ आणि पेल्यामध्ये शीतपेय देत होता. संपदाचा सहभाग नसल्यामुळे कसलेही न्यून राहू नये याची तो प्रयत्नपूर्वक काळजी घेत होता.

गणपतीच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे त्यावर्षीसुध्दा नेहमीचे परिचित लोक आले. त्यात संपदाच्या खास मैत्रिणीही आल्या. दर्शन आणि तीर्थप्रसाद घेऊन झाल्यावर त्या संपदाला भेटायला आतमध्ये गेल्या. संपदा म्हणाली, "या वर्षी मी अशी नुसती पडून राहिली आहे, मला तर काहीच करता येत नाही आहे." "खरंच गं, यंदा जरासुध्दा मजा नाही आली." एक मैत्रिण उद्गारली. योगायोगाने हे शब्द संदीपच्या कानावर पडले आणि तो थोडा खट्टू झाला. आपल्या प्रयत्नात न्यून राहून गेले याची खंत त्याच्या मनाला बोचत राहिली, तसेच नेमके काय कमी पडले याचे गूढ त्याला पडले.

पुढच्या वर्षातला गणेशोत्सव आला. दुस-या दिवशी रविवार असल्याने सगळ्या आप्तेष्टांना संपदाने घरी बोलावले. त्या दिवशी ती नेमके काय खास करणार आहे हे समजून घेण्यासाठी संदीपने तिच्या हालचालीवर बारीक नजर ठेवली होती. दुपारपर्यंत त्याला काहीच वेगळे जाणवले नाही. चहाच्या सुमाराला संपदाची मैत्रिण सुकन्या आली आणि दोघीजणींनी आत जाऊन कपड्यांची कपाटे उघडून साड्यांचे गठ्ठे बाहेर काढले. त्यातल्या एकेक साडीचा प्रकार, पोत, किंमत, ती कोणत्या प्रसंगी आणि कुठल्या शहरातल्या कुठल्या दुकानातून विकत घेतली की भेट मिळाली वगैरेवर चर्चा करता करताच "ही साडी खूप तलम आहे तर ती जास्तच जाड आणि जड आहे, एकीचा रंग फारच फिका आहे तर दुसरीचा जरा भडकच आहे, एक आउट ऑफ फॅशन झाली आहे तर दुसरी एकदम मॉड आहे" वगैरे कारणांनी त्या बाद होत गेल्या. एक साडी चांगली वाटली पण तिचा फॉल एका जागी उसवला होता, तर दुसरीच्या मॅचिंग ब्लाउजचा हूक तुटला होता. असे करून नकारता नकारता अखेर एक छानशी साडी पसंत पडली, त्याला अनुरूप ब्लाउज, पेटीकोट वगैरे सारे काही नीट होते आणि ती साडी नेसून संपदा तयार झाली.

त्या साडीला पिना, टाचण्या टोचून आणि वेगवेगळ्या कोनातून आरशात निरखणे चालले असतांनाच संपदाची दुसरी मैत्रिण समिधा आली. उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणे आणि त्याची कारणे सांगून झाल्यावर ती उद्गारली, "हे काय? आज ही साडी नेसणार आहेस तू?"
संपदा आणि सुकन्या दोघीही आ वासून पहात राहिल्या. एकदम म्हणाल्या "कां ग?, काय झालं?"
"अगं, असं काय पाहते आहेस?, मागच्या महिन्यात प्रतीक्षाच्या नणंदेच्या मंगळागौरीला तू हीच साडी नेसली नव्हतीस का?" समिधा म्हणाली.
"हो का? त्या दिवशी मी मला माझ्या जावेकडे जावं लागलं होतं त्यामुळे मी आले नव्हते. पण समिधाचं म्हणणं बरोबर आहे, आज प्रतीक्षा इथे आली तर ती काय म्हणेल?" सुकन्याने दुजोरा दिला.
त्यामुळे वेगळ्या साडीसाठी नव्याने संशोधन सुरू झाले. आधी पाहिलेल्या बनारसी, कांजीवरम, पटोला, चंदेरी, आसाम सिल्क, इटालियन क्रेप, आणखी कुठली तरी जॉर्जेट वगैरे सगळ्यांची उजळणी झाली. शिवाय साडीच कशाला म्हणून निरनिराळे ड्रेसेसही पाहून झाले, संपदा एकटी असती तर तिने पंधरा मिनिटात निर्णय़ घेतला असता, दोघींना मिळून दुप्पट वेळ लागला होता. आता तीन डोकी जमल्यावर तिप्पट वेळ लागणे साहजीक होते. अखेर कपड्यांचा निर्णय पक्का झाल्यानंतर दागिन्यांचे बॉक्स बाहेर निघाले. त्यातसुध्दा कुठले हलके, कुठले जड, कोणते चीप वाटणारे तर कोणते गॉडी, कोणते चांगले आहेत पण डल् पडले आहेत, कोणते जास्तच ब्राइट वाटतात वगैरे ऊहापोह झाल्यावर निवड झाली. आता निरनिराळ्या सौंदर्यप्रसाधनांचे डबे काढून त्यावर चर्चा सुरू झाली होती तेवढ्यात बाहेर कोणी आल्याची चाहूल लागली.

ठीकठाक पोशाख करून संदीप केंव्हाच तयार होऊन बसला होता. त्याने पाहुण्यांचे स्वागत केले. "एक मिनिटात मी येतेय् हं." असे आतूनच संपदाने सांगितले. बाहेर आणखी दोन तीन कुटुंबे आली. संदीपने त्यांची आवभगत करून संभाषण चालू ठेवले. महागाई, पर्यावरण, ट्रॅफिक जॅम यासारख्या विषयावर पुरुषमंडळी थोडी टोलवाटोलवी करत होती आणि महिलावर्ग संपदाची वाट पहात होता. दहा बारा मिनिटांनी तीघी मैत्रिणी तयार होऊन बाहेर आल्यावर चर्चेची गाडी सांधे बदलून साड्या, ड्रेसेस, कॉस्मेटिक्स, ज्युवेलरी वगैरे स्टेशनांवरून धावू लागली. आता पुरुषमंडळी प्रसादाच्या प्लेटची वाट पहात आणि त्यातले पदार्थ चवीने खाण्यात गुंगली.

संदीपला वर्षभर सतावणारे कोडे सुटले, त्याच्या मनातली खंत मिटली आणि गणेशोत्सवात भेट देणारी मंडळी देवाच्या दर्शनासाठी किंवा त्याला भेटायला येतात हा त्याचा गोड गैरसमज दूर झाला.

Friday, September 10, 2010

हरतालिका

आज हरतालिका किंवा बोलीभाषेत हरताळका आहे. देवीची पूजा तिच्या अनेक रूपात केली जाते, विशेषतः काली, दुर्गा, चामुंडा आदि रूपांमध्ये ती दुष्टांचा नाश करतांना दिसते, तर लक्ष्मीच्या रूपात सुखसंपत्ती देणारी आणि सरस्वती किंवा शारदेच्या रूपात ती विद्यादायिनी किंवा कलेची अधिष्ठात्री असते. या इतर रूपांमध्ये स्त्री व पुरुष दोघेही तिची आराधना करतात, पण हरताळका, मंगळागौर वगैरे कांही व्रते मात्र खास स्त्रीवर्गासाठी राखून ठेवल्या आहेत. त्यात त्यांचेसाठी १०० टक्के आरक्षण असते. अविवाहित मुली आपल्या मनासारखा वर मिळावा म्हणून हे व्रत करतात आणि विवाहित स्त्रिया मिळालेला नवरा सोबत रहावा म्हणून ती चालू ठेवतात. या दिवशी देवी पार्वतीची पूजा कराय़चे मुख्य कारण म्हणजे तिने अशी मनोकामना धरली आणि ती पूर्ण करून दाखवली. त्यामुळे तिचे वरदान मिळाल्यावर आपली इच्छा पूर्ण करायला ती मदत करेल अशी अपेक्षा धरणे साहजीक आहे.

कन्या वरयते रूपम् माता वित्तम् पिता श्रुतिम् असे एक सुभाषित आहे. आपल्या मुलीला कसली ददात पडू नये या दृष्टीने विचार करता तिचा नवरा गडगंज श्रीमंत असावा असे तिच्या आईला वाटते, तर त्या माणसाचा नावलौकिक चांगला असावा अशी मुलीच्या बापाची इच्छा असते. कन्येला मात्र या दोन्हीपेक्षा रूपाचे महत्व जास्त वाटते. पार्वतीच्या बाबतीत असेच दिसते. तिच्या पहिल्या जन्मात दक्ष राजा तिचा पिता होता आणि दुस-या जन्मात नगाधिराज हिमालय. आपल्या मुलीला धनवान आणि सामर्थ्यवान पती मिळवून देणे या दोघांनाही सहज शक्य होते आणि तसा प्रयत्न ते करत होते. पण उमा व पार्वती यांना मात्र शंकराशीच लग्न करायचे होते. तो कसा होता?
उसकी निशानी वो भोला-भाला, उसके गले में सर्पों की माला ।
वो कई हैं जिसके रूप, कहीं छाँव कहीं धूप, तेरा साजन है या बहुरूपिया
आणि
घोड़ा न हाथी करे बैल सवारी, कैलाश परवत का वो तो जोगी, अच्छा वही दर-दर का भिखारी

असा विचित्र वर तिला पिया म्हणून हवा हवासा वाटत होता. आणि आधी हे प्रेम एकतर्फीच होते. शंकराची प्राप्ती व्हावी यासाठी पार्वतीने तपश्चर्या केली. स्व.शांता शेळके यांच्या शब्दात सांगायचे झाले तर
भस्मविलेपित रूप साजिरे । आणुनिया चिंतनी, अपर्णा तप करिते काननी !।
वैभवभूषित वैकुंठेश्वर । तिच्या पित्याने योजियला वर । भोळा शंकर परी, उमेच्या भरलासे लोचनी ।।
त्रिशूल डमरू पिनाकपाणी । चंद्रकला शिरि सर्प गळ्यातुनि । युगायुगांचा भणंग जोगी, तोच आवडे मनी ।।
कोमल सुंदर हिमनगदुहिता । हिमाचलावर तप आचरिता । आगीमधुनी फूल कोवळे, फुलवी रात्रंदिनी ।।

तपश्चर्येने शंकर बधला नाही हे पाहून तिने भिल्लिणीचे रूप घेऊन त्याचे मन मोहून घेतले. हा देखील तपश्चर्येचाच एक भाग म्हणता येईल. त्यानंतर मात्र शिव आणि शक्ती यांचे मीलन झाले.

उमेच्या रूपात लग्न झाल्यानंतर ती माहेराला दुरावली होती. दक्ष राजाने एक मोठा यज्ञ केला त्यासाठी विश्वातल्या सर्व लहान मोठ्या लोकांना आमंत्रण दिले पण शंकराला दिले नाही. तरीसुध्दा माहेरच्या ओढीने तिने आपणहून तिथे जायचे ठरवले. पण अपेक्षेसारखे तिचे स्वागत झाले नाही, तिच्या नव-याचा अनादराने उल्लेख केला गेला. ही गोष्ट त्या मानिनीला सहन झाली नाही आणि तिने यज्ञाच्या कुंडात स्वतःची आहुती दिली. स्व.ग.दि.माडगूळकरांनी या प्रसंगाचे सुंदर वर्णन केले आहे.
मानभंग हाचि झाला मंडपी आहेर । उमा म्हणे, यज्ञी माझे जळाले माहेर ।।
माहेरीच्या सोहळ्यात, नाहि निमंत्रिले जामात । चहू दिशी चालू होते संपदेचे थेर ।।
लक्ष्मीचे जमले दास, पुसे कोण वैराग्यास । लेक पोटीचीही झाली कोप-यात केर ।।
आई-बाप, बंधु-बहिणी, दारिद्र्यात नसते कोणी । दीन दानतीचे सारे धनाचे कुबेर ।।
दक्षसुता जळली मेली, नवे रूप आता ल्याली । पित्याघरी झाला ऐसा, दिव्य पाहुणेर ।।
परत सासु-याशी जाता, तोंड कसे दावू नाथा । बोल ईश्वराचे झाले सत्य की अखेर ।।
प्राणनाथ करिती वास, स्वर्गतुल्य तो कैलास । नाचतात सिद्धी तेथे, धरूनिया फेर ।।
असो स्मशानी की रानी, पतीगृही पत्‍नी राणी । महावस्त्र तेथे होते सतीचे जुनेर ।।

या दोन्ही काव्यांमध्ये पौराणिक कथेतला दृष्टांत देऊन त्याची आधुनिक काळातल्या गोष्टींबरोबर सुरेख सांगड घातली आहे.

Wednesday, September 08, 2010

मराठी मातृदिन



काल सहज कॅलेंडर पहात असतांना दिसले की कालचा दिवस 'मातृदिन' होता. ते पाहून मला जरासे आश्चर्यच वाटले. तीन महिन्यापूर्वीच 'मदर्स डे' येऊन गेला होता. काही मुलांनी त्या दिवशी त्यांच्या मातांना भेटकार्डे पाठवली होती, तर कोणी आपल्या माताश्रींना घेऊन मॉल्समध्ये गेले होते आणि त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीच्या लिपस्टिक्स, क्रीम्स आदि सौंदर्यप्रसाधने त्यांना घेऊन दिली होती, कांही आयांनी तिथल्या रेस्तराँमध्ये आपल्या आवडत्या पदार्थांची खादाडी करून घेतली होती. मी ही त्या दिवसाच्या निमित्याने या ठिकाणी एक लेख लिहून मातांची महती सांगितली होती. आता लगेच पुन्हा कसा मातृदिन आला असा प्रश्न मला पडला. अर्थातच हा भारतीय किंवा मराठी संस्कृतीतला सण असणार हे उघड होते.

माझ्या आठवणीत तरी हा सण साजरा केलेला मला आठवत नव्हता. लहान असतो तर मी हा प्रश्न माझ्या आईला विचारला असता आणि तिने नक्की त्याचे उत्तर दिले असते. सणवार, व्रतेवैकल्ये या बाबतीत ती तर चालका बोलता ज्ञानकोष होती. सगळ्या कहाण्या तिला तोंडपाठ होत्या. तरीसुध्दा दर वर्षी श्रावण महिन्यात रोज संध्याकाळी घरातल्या मुलांना एकत्र बसवून त्या त्या दिवसाची किंवा तिथीची कहाणी मोठ्याने वाचायला ती सांगत असे आणि स्वतः शेजारी बसून भक्तीभावाने त्या ऐकत असे. वाचणा-या मुलाने चूक केली तर ती लगेच दाखवूनही देत असे. पण मला तरी कधी मातृदिनाची कहाणी वाचल्याचे आठवत नव्हते. संध्याकाळी टीव्ही पहातांना त्यातल्या एका मालिकेत पिठोरी अमावास्येचे व्रत करतांना दाखवले. आपल्या मुलांना उदंड आयुष्य लाभो या इच्छेने माता हे व्रत करतात एवढे त्यातून समजले. कधी कधी मनोरंजनातूनही ज्ञानात भर पडते असे म्हणतात ते यासाठीच.

आईला विचारण्याची सोय आता उपलब्ध नसल्यामुळे गुगलवर शोध घेऊन पाहिले. मातृदिन आणि पिठोरी अमावास्येसंबंधी त्रोटक माहिती मिळाली. आपण मदर्स डे ऐवजी मातृदिन का साजरा करू नये असा प्रश्नसुध्दा एका अनुदिनी लेखकाने विचारला होता. पिठोरी अमावस्येचे व्रत माता आपल्या मुलांसाठी करतात आणि मदर्स डे हा दिवस मुले त्यांच्या मातांसाठी साजरी करतात हा फरक त्याच्या लक्षात आला नसावा. "फादर्स डे आणि मदर्स डे करून जीवंतपणीच आपल्या आईबापांचे कसते दिवस घालता?" असा प्रश्न मकरंद अनासपुरे एका चित्रपटात आपल्या इंग्रजाळलेल्या मित्रांना विचारतो ते ही आठवले.

या मराठी मातृदिनाच्या दिवशी माता पिठोरी अमावस्येचे व्रत करतात. त्या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी आठ कलशांवर आठ मातृका (देवीची रूपे) ठेऊन त्यांची आणि चौसष्ठ योगिनींची पूजा करतात आणि आपले सौभाग्य आणि विशेषतः मुलांसाठी आयुरारोग्य, सुखसंपत्ती वगैरे मागून त्यांच्यासाठी प्रार्थना करतात. व्रतासाठी केलेले पक्वान्न म्हणजे बहुधा पु-या डोक्‍यावर घेऊन "कोण अतिथी आहे काय?' असे विचारतात. एकेक मुलांनी मागून येऊन उत्तर द्यायचे. "मी आहे." आणि एक पुरी घ्यायची. अखेर आईने त्या सगळ्या मुलांना पक्वान्ने खायला घालायची. पूर्वी पूजेच्या मूर्ती पिठाच्या करीत सध्या तशी चित्रे मिळतात. या दिवशी नैवेद्यासाठी सगळी पिठाची पक्वान्ने बनवतात म्हणून या दिवसाला "पिठोरी अमावस्या' असे नाव पडले असणार.

पुराणकाळात एका स्त्रीला दरवर्षी श्रावण अमावास्येला एक मूल होत असे आणि लगेच ते मरून जात असे. त्याच दिवशी तिच्या आजे सास-याचे श्राध्द असे पण श्राध्दाला आलेले भटजी उपाशीच निघून जात असत. असे ओळीवार सात वर्षे झाल्यानंतर त्या स्त्रीच्या सास-याने तिला तिच्या नवजात अर्भकाच्या शवासकट घरातून हाकलून दिले. निराधार होऊन मरण्यासाठी ती बाई अरण्यात जाते. त्या निराश स्त्रीला रानात चौसष्ट योगिनी भेटल्या. तिने त्यांना आपले दुःख सांगितल्यावर "तुझी-मुले जगतील' असा योगिनींनी वर दिला. त्या वरामुळे त्या स्त्रीचे सर्व मुलगे जिवंत झाले. मग त्या स्त्रीने आपल्या पुत्रांसह घरी जाऊन चौसष्ट योगिनींची पूजा केली. अशी या व्रताची कथा आहे.

ज्ञात असलेली बहुतेक सगळ्या प्रकारची व्रते करणारी माझी आई हे व्रत का करत नव्हती असा विचार माझ्या मनात आला आणि त्याचे उत्तरही मिळाले. ज्यांची मुले जगत नाहीत अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत करतात. सर्व स्त्रियांनी केलेच पाहिजे असे हे व्रत नाही. ज्यांची संतती जगत नाही, अशाच स्त्रियांनी हे व्रत करावे. आमच्या घरी हा प्रॉब्लेम नसल्यामुळे हे व्रत कधी झाले नाही.

यासंबंधी अधिक माहिती गूगलवर आणि खालील स्थळांवर मिळेल.
http://marathiakanksha.blogspot.com/2010/08/blog-post_18.html
http://www.khapre.org/portal/url/mr/sahitya/katha/pauranik/04/z71224225355(कहाणी.पिठोरीची).aspx

Saturday, September 04, 2010

श्रीकृष्ण गीते भाग १ -२

आज गोकुळाष्टमी किंवा जन्माष्टमी आहे. कृष्ण हा हिंदू धर्मीयांचा अत्यंत लाडका आणि मनाजोगा देव असल्यामुळे हा सण भक्तीभावाने म्हणण्यापेक्षा उत्साहाने आणि जल्लोषात साजरा केला जातो. काही लोकांच्या घरी हा आनंदोत्सव आठवडाभर साजरा केला जातो. गणेशोत्सव किंवा नवरात्राप्रमाणे या सात आठ दिवसात कृष्णाच्या मूर्तीची सजावट करून तिच्यासमोर संगीत नृत्य आदी सेवा सादर करतात. या सजावटीमध्ये कृष्णाच्या जन्मातल्या अनेक प्रसंगांची चित्रे असलेल्या झांक्या मुख्यतः असतात. या निमित्याने कृष्णाच्या जीवनामधील कांही घटनांवर लिहिलेली गाणी सादर करण्याचा विचार आहे.

यातले पहिले गाणे सत्यभामेच्या तोंडी आहे. सत्यभामा आणि रुक्मिणी या श्रीकृष्णाच्या प्रमुख राण्या सर्वांना माहीत आहेत. यातली रुक्मिणी ही आदिशक्ती, आदिमायेचा अवतार असल्याने तिच्यात दैवी गुण होते, तर सत्यभामा पूर्णपणे मानवी आहे. मनुष्याच्या मनात उठणारे सारे विकार तिच्या मनात उठत असतात. याचा फायदा घेऊन नारदमुनी कळ लावण्याचे काम करत असतात. ते एकदा सत्यभामेला एक पारिजातकाचे फूल आणून देतात. त्याकाळात हे फूल फक्त स्वर्गलोकात उपलब्ध होते. त्या फुलाचे अनुपम सौंदर्य आणि नारदमुनींनी केलेले त्याचे रसभरीत वर्णन ऐकून सत्यभामा त्या फुलावर इतकी लुब्ध होते की मला रोज हे फूल हवे असा हट्ट कृष्णाजवळ धरते. कृष्णभगवान तिचा हट्ट पुरवण्यासाठी पारिजातकाचे एक रोप स्वर्गामधून मागवतात आणि सत्यभामेच्या महालाच्या कुंपणाशेजारी ते लावतात. ते झाड वाढतांना पहात असतांना सत्यभामा प्रेमाने आणि अहंकाराने त्याच्याकडे पहात असते. शेजारच्या महालात रहात असलेल्या रुक्मिणीकडे हे झाड नाही, तिला न देता श्रीकृष्णाने ते खास आपल्याला दिले आहे यामुळे आपण वरचढ असल्याचा आभास होऊन ती अतीशय सुखावते. त्याचा उल्लेख करून रुक्मिणीला सारखी डिवचत असते, पण रुक्मिणी तिच्याकडे लक्षच देत नाही.

झाड मोठे झाल्यावर त्याला कळ्यांचा बहर येतो. उद्या त्या उमलतील, आपण त्या फुलांचा गजरा करून तो आपल्या केशसंभारावर माळू आणि द्वारकेतल्या लोकांना दुष्प्राप्य असलेले हे वैभव सगळ्यांना दाखवू, ते पाहून रुक्मिणी चिडली, आपल्यावर जळफळली तर कित्ती मजा येईल अशा प्रकारचे विचार करत ती झोपी जाते. दुस-या दिवशी सकाळी उठून प्राजक्ताची फुले वेचण्यासाठी ती अंगणात जाते आणि पहाते की तिच्या झाडावरली फुले वा-याने उडून शेजारच्या रुक्मिणीच्या अंगणात पडत आहेत आणि ती बया शांतपणे त्यांचा हार गुंफत बसली आहे. हार गुंफून झाल्यानंतर रुक्मिणी तो हार कृष्णालाच समर्पण करते. हे पाहून दिग्मूढ झालेली सत्यभामा स्वतःशीच म्हणते,

बहरला पारिजात दारी
फुले का, पडती शेजारी ?

...... हे काय होऊन बसले आहे ? या अनपेक्षित गोष्टीचा तिला आश्चर्याचा धक्का बसतो.

माझ्यावरती त्यांची प्रीती
पट्टराणि जन तिजसी म्हणती
दुःख हे, भरल्या संसारी !

..... कृष्णाचे सर्वात जास्त प्रेम तिच्यावर आहे अशी तिची समजूत असते. कृष्णाचे तिच्याबरोबर असलेले लाघवी वागणे तिला सारखे हेच दाखवत असते, पण लोकांच्या नजरेत मात्र ती 'दुसरी' असते. रुक्मिणी हीच मुख्य पत्नी किंवा पट्टराणी, सगळा मान सन्मान नेहमी तिला मिळत असतो हे सत्यभामेला सहन होत नसते. तिला हे दुःख सारखे टोचत असते. आजही पारिजातकाची फुले रुक्मिणीच्या अंगणात पडल्याचे पाहून सत्यभामा अत्यंत दुःखी होते.

असेल का हे नाटक यांचे,
मज वेडीला फसवायाचे ?
कपट का, करिति चक्रधारी ?

. . . . . . हळूहळू तिच्या डोक्यात वेगळा प्रकाश पडतो. धूर्त कृष्णाने हे मुद्दाम केले असेल का? ते आपल्याशी कपटाने वागले का अशा संशय तिच्या मनात उत्पन्न होऊ लागतो.

वारा काही जगासारखा
तिचाच झाला पाठीराखा
वाहतो, दौलत तिज सारी !

. . . . . . . . कृष्णावरचा राग हा केवळ संशयावरून आलेला आहे, पण वा-याने केलेली कृती समोर दिसते आहे. तिच्या लहानशा जगातले सगळे प्रजाजन जसे रुक्मिणीलाच अधिक मान देतात त्यांच्याप्रमाणे हा वारा सुध्दा पक्षपाती झाला आहे. आपल्या अंगणातील प्राजक्तपुष्पांची दौलत हा वारा खुषाल तिला बहाल करतो आहे. हा आपल्यावर केवढा अन्याय आहे या विचाराने ती चिडून उठते, पण आपण त्याला काहीही करू शकत नाही ही निराशेची असहाय्यतेची भावना तिच्या मनाला ग्रासून टाकते.

अशा प्रकारे सत्यभामेच्या मनात उठणा-या विविध भावनातरंगांचे सुरेख चित्रण या गीताच्या तीन कडव्यातून कवीवर्य ग.दि.माडगूळकरांनी केले आहे. स्व.सुधीर फडके यांनी दिलेल्या सुमधुर चालीवर स्व. माणिक वर्मा यांनी अशा आर्ततेने हे गाणे गायिलेले आहे की एकदा ऐकले तर ते आतमध्ये कुठेतरी रुतून बसते. आज ही त्रयी आपल्यात नसली तरी अशा अजरामर कृतींमुळे ते अमर झाले आहेत. मधुवंती या मधुर रागावर आधारलेले हे गाणे एका काळी आकाशवाणीवरील संगीतिकेसाठी बसवले होते हे आज ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल.


गीत - ग. दि. माडगूळकर, संगीत - सुधीर फडके, स्वर - माणिक वर्मा, पुणे आकाशवाणी संगितिका ’पारिजातक’

------------------------------------------------------------
बंधुभगिनीभाव

श्रीकृष्णाचे जीवन अद्भुत आणि अगम्य घटनांनी भरलेले आहे. रॅशनल विचार करून त्याची नीट सुसंगती लागत नाही. पौराणिक कालखंडात अगदी अटळ समजली जाणारी आकाशवाणी खोटी ठरवण्यासाठी कंसमामा आयुष्यभर प्रयत्न करत राहिला. त्या प्रयत्नात अनेक दुष्टांचा नाश झाला, तसेच निष्पाप जीवांचाही बळी गेला. देवकीच्या सर्व पुत्रांचा जन्मतःच कपाळमोक्ष करण्याचा चंग कंसाने बांधला होता, तरीही बलराम त्याच्या जन्माच्याही आधी आणि श्रीकृष्ण नवजात बालक असतांना सुखरूपपणे गोकुळाला जाऊन पोचले. त्याच्या पाठीवर जन्माला आलेली सुभद्रा कंसाच्या तावडीतून कशी सुटली, तिचे बालपण कुठे गेले वगैरेबद्दल मला काहीच माहिती नाही. महाभारताची जेवढी गोष्ट मला ठाऊक आहे त्यात सुभद्रेचा प्रवेश ती उपवर झाली असतांना होतो. कृष्णाच्या सहाय्याने अर्जुन तिचे हरण करून (पळवून) नेतो. या कथेवर संगीत सौभद्र हे नाटक रचलेले आहे. त्यानंतर सुभद्रा जी लुप्त होते ती कौरवांचा चक्रव्यूह भेदतांना अभिमन्यूला वीरगती प्राप्त झाल्यानंतर शोकाकुल झालेल्या मातेच्या रूपातच पुन्हा भेटते. कृष्ण आणि बलराम यांचे बालपण गोकुळात जाते आणि कंसाच्या वधानंतर लगेच ते सांदीपनीच्या आश्रमात अध्ययनासाठी जातात आणि चौदा वर्षानंतर माघारी येतात. त्यानंतर सारा काळ धामधुमीचा असतो. त्यामुळे ही बहीण भावंडे कोणत्या काळात आणि कुठे एकत्र राहतात कोण जाणे.

अर्जुन हा श्रीकृष्णाचा आतेभाऊ असतो. या नात्याने श्रीकृष्ण आणि द्रौपदी हे दीर भावजय लागतात, पण ते एकमेकांना बहीण भाऊ मानतात. कृष्णाला जशी सुभद्रा ही सख्खी बहीण असते तसाच द्रौपदीला धृष्टद्युम्न हा सख्खा भाऊ असतो, पण श्रीकृष्ण आणि द्रौपदी ही बंधुभगिनीची जोडी अद्वितीय मानली गेली आहे आणि आदर्श नातेसंबंधांचे उदाहरण म्हणून तिचा उल्लेख केला जातो. त्यांनी अनेक कवींना स्फूर्ती दिली आहे. सखाराम गटणेचे पात्र रंगवतांना पु.ल.देशपांडे यांनी लिहिल्याप्रमाणे मीसुध्दा एका वयात श्यामची आई हे जगातले सर्वश्रेष्ठ पुस्तक आणि साने गुरुजी हे सर्वश्रेष्ठ लेखक मानत होतो. मी त्या वयात असतांना आचार्य अत्रे यांचा श्यामची आई हा चित्रपट आला. त्यातले त्यांनीच लिहिलेले आणि आशाताईंनी गायिलेले एक गाणे अजरामर झाले. कोकणातल्या येश्वदेच्या तोंडी शोभून दिसतील अशी आचार्यांची साधी पण भावपूर्ण शब्दरचना आणि साधी सोपी, लोकगीताच्या वळणाने जाणारी वसंत देसाई यांनी दिलेली चाल मनात घर करून राहते.

भरजरी ग, पितांबर, दिला फाडुनं । द्रौपदिसी बंधु शोभे नारायण ।।

सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण । विचाराया गेले नारद म्हणून ।
बोट श्रीहरिचे कापले ग बाई । बांधायाला चिंधी लवकर देई ।
सुभद्रा बोलली, "शालु नि पैठणी । फाडुन का देऊ चिंधी तुम्हास मी ?"
पाठची बहिण झाली वैरिण !

द्रौपदी बोलली, "हरिची मी कोण ? परी मला त्याने मानिली बहीण ।
काळजाचि चिंधी काढून देईन । एवढे तयाचे माझ्यावरी ऋण ।
वसने देउन प्रभू राखी माझी लाज । चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज !"
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून । प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण ।
जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण ।।

रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम । पटली पाहिजे अंतरीची खुण ।
धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण । प्रीती ती खरी जी जगी लाभाविणं ।
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न ।।

"वसने देउन प्रभू राखी माझी लाज" या ओळीवरून असे दिसते की कृष्णाच्या बोटाला चिंधी बांधण्याचा हा प्रसंग द्रौपदीवस्त्रहरण होऊन गेल्यानंतर घडलेला असावा. कृतज्ञतेच्या भावनेतून द्रौपदीने आपले वस्त्र फाडून त्याची चिंधी काढून दिली असे कदाचित वाटेल. पण खाली दिलेल्या गाण्यावरून असे दिसते की कृष्णाच्या बोटाला झालेली जखम पाहून द्रौपदीचे हृदय कळवळले आणि पुढचा मागचा विचार न करता तिने पांघरलेल्या भरजरी शेल्याची चिरफाड केली. यावर कृष्ण प्रसन्न होऊन द्रौपदीला आश्वासन देतो, "तुला जर कधी गरज पडली तर मी नक्की धावून येईन." त्यावर द्रौपदी म्हणते, "तुझ्यासारखा पाठीराखा असतांना मला कसली काळजी?" या संवादावरून असे वाटते की द्रौपदीच्या चिंधीची परतफेड कृष्णाने द्रौपदीला अगणित वस्त्रे देऊन केली. हे गाणे कवीवर्य ग.दि.माडगूळकरांनी लिहिले असून सुधीर फडके यांनी स्वरबध्द केले आहे. हे गीतदेखील आशाताईंनीच गायिले आहे.

चिंधी बांधिते द्रौपदी, हरिच्या बोटाला !
भरजरी फाडुन शेला, चिंधी बांधिते द्रौपदी हरिच्या बोटाला
बघून तिचा तो भाव अलौकीक
मनी कृष्णाच्या दाटे कौतुक
कर पाठीवर पडला अपसुक
प्रसन्न माधव झाला, चिंधी बांधिते द्रौपदी, हरिच्या बोटाला !
म्हणे खरी तू माझी भगिनी
भाऊ तुझा मी दृपद नंदिनी
साद घालता येईन धावुनी
प्रसंग जर का पडला, चिंधी बांधिते द्रौपदी हरिच्या बोटाला !
प्रसंग कैसा येईल मजवर
पाठीस असशी तू परमेश्वर
बोले कृष्णा दाटून गहिवर
पूर लोचना आला, चिंधी बांधिते द्रौपदी, हरिच्या बोटाला !


कवी योगेश्वर अभ्यंकर यांनी लिहिलेल्या खालील गाण्यात द्रौपदीने व्याकुळ होऊन कृष्णाचा धांवा केला आहे. अशा प्रसंगी द्रौपदी स्वतः होऊन चिंधीचा उल्लेख करेल अशी शक्यताच नाही. ती फक्त आपल्या असहाय्य परिस्थितीचे निवेदन करून कृष्णाची आळवणी करते आहे. त्या काळच्या भयाकुल अवस्थेत तिच्या मिटलेल्या डोळ्यांच्या पुढे तिला सावळ्या गोपाळाचे रूप दिसते आणि तिला धीर देते. श्रीनिवास खळे यांनी दिलेल्या अप्रतिम चालीवर हे गीत माणिक वर्मा यांनी गायिले आहे.

तव भगिनीचा धावा ऐकुनि, धाव घेइ गोपाळा ।
गोपाळा, लाज राख नंदलाला ।।

द्यूतामध्ये पांडव हरले, उपहासाने कौरव हंसले
लाज सोडुनी सभेत धरिले, माझ्या पदराला ।।

अबलेसम हे पांडव सगळे, खाली माना घालुनि बसले ।
आणि रक्षाया शील सतीचे, कुणी नाही उरला ।।

आंसू माझिया नयनी थिजले, घाबरले मी, डोळे मिटले ।
रूप पाहता तुझे सावळे, प्राण आता उरला ।।

Wednesday, September 01, 2010

पंपपुराण - द्वितीय खंड - १०

अगदी लहानपणापासून पंप या शब्दाबरोबर माझी ओळख कशी झाली आणि ती हळूहळू कशी वाढत गेली ते थोडक्यात सांगून झाल्यानंतर सेंट्रिफ्यूगल पंपांच्या विविध रूपांचे दर्शन मी या लेखमालेच्या पहिल्या खंडात करून दिले होते. त्यानंतर या विषयाला थोडी विश्रांती देऊन काही काळानंतर पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंपांचे ठळक प्रकार या लेखमालेच्या पहिल्या नऊ भागात पाहिले. या सर्वांचा थोडक्यात परामर्ष घेऊन हा खंड आता संपवत आहे.

रहाटगाडगे, मोट यासारखी पाणी उपसण्यासाठी उपयुक्त साधने निरनिराळ्या स्वरूपात जगभरात सगळीकडे अनादि काळापासून प्रचारात आहेत. यातला पोहरा (किंवा बकेट, घागर, बादली इ.) पाण्यात सोडला जातो आणि पाण्याने भरून तो वर ओढला जातो. हे नक्कीच सकारात्मक उत्थान किंवा पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट आहे. हाताने दांडा खालीवर करून पाणी उपसण्याचा पंप याच प्रकारात मोडतो आणि जेम्स वॉटने तयार केलेल्या पहिल्या वाफेच्या इंजिनालासुध्दा असाच पंप त्याने जोडला होता. आपल्या आप स्वतःभोवती गिरक्या घेणारी यंत्रांची चक्रे वेगाने फिरायला लागल्यानंतरच्या काळात त्यांना जोडून त्यांच्या सहाय्याने फिरणारे सेंट्रिफ्यूगल पंप पुढे आले.

विशेषतः सुटसुटीत आकाराची ऑइल इंजिन्स आणि त्यांच्यापेक्षाही सुलभपणे चालवता येणा-या विजेच्या मोटारी यांच्या सोबतीने आलेल्या सेंट्रिफ्यूगल पंपांनी पाणीपुरवठ्याच्या क्षेत्रात इतके क्रांतिकारक बदल घडवून आणले की त्यामुळे मानवाचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. पूर्वीच्या काळात नदी, तलाव, विहीर यासारख्या पाणवठ्याच्या जागेवरून घरात पाणी उचलून आणावे लागत असे. कोणी पाण्याने भरलेले घट डोईवर घट कमरेवर ठेऊन तर कोणी खांद्यावरून कावडी किंवा पखाली वाहून ते आणण्याचे काम करत असे. हे एक अतीशय कष्टाचे आणि रोजचे काम असल्यामुळे त्यातच दिवसातला बराच वेळ खर्च होत असे. त्यामुळे पूर्वीच्या काळातली मानववस्ती पाणवठ्याच्या काठाकाठानेच होत असे आणि घरांची रचनासुध्दा बाहेरून पाणी आणण्याची सोय पाहून त्यानुसार होत असे. पंपाच्या आगमनानंतर हे चित्र पार बदलून गेले. पाणवठ्यापासून दूर असलेल्या नागरी वस्तीमधील घराघरापर्यंत नळातून पाणी येऊन पोचू लागले आणि घराजवळ बसवलेल्या पंपांमधून ते बहुमजली इमारतीच्या डोक्यावर ठेवलेल्या टाक्यांपर्यंत हव्या तेवढ्या उंचीवर चढवता आल्यामुळे घरातल्या कोणत्याही खोलीपर्यंत आणता येऊ लागले. या सोयीमुळे नगररचना तसेच घरांची अंतर्गत रचना पार बदलत गेली.

पूर्वीच्या काळातसुध्दा काही ठिकाणी नद्यांना बंधारे घालून त्यात साठलेले पाणी पाटांमधून वळवले जात असे आणि विहिरींमधले पाणी मोटेने उपसून ते पिकांना दिले जात असे. पण या दोन्हींमध्ये ते पाणी जमीनीच्या उतारावरून जितके दूर वहात जाईल तेवढ्या प्रदेशापर्यंतच पोचत असे. यामुळे बहुतेक ठिकाणची शेती मुख्यतः कोरडवाहू असे आणि सर्वस्वी ती पर्जन्यराजाच्या कृपेवर अवलंबून असे. जलाशयांमधून पंपाने पाणी उपसण्याची आणि पाइपांमधून ते हवे तिकडे वाहून नेण्याची सोय झाल्यानंतर अनेक भागात बागायती करणे शक्य झाले. स्प्रिंकलर आणि ठिबकसिंचन वगैरे सुधारणांमुळे पाण्याची बचत करून त्याचा जास्त चांगला उपयोग होऊ लागला. त्यामुळे कृषीउत्पादनात भरघोस वाढ झाली.

मुबलक पाणी उपलब्ध झाले आणि त्याचा दाब हवा तेवढा वाढवणे शक्य झाले या सुधारणा झाल्यानंतर त्यांचा उपयोग कारखानदारीतसुध्दा मोठ्या प्रमाणात होऊ लागला. वीज निर्मिती आणि रासायनिक प्रक्रिया करणा-या कारखान्यांना यांची फार गरज असते. त्यांची प्रचंड प्रमाणात वाढ होऊन नवनव्या वस्तूंचे उत्पादन सुरू झाले आणि माणसाचे रोजचे जीवन बदलून गेले. शंभर वर्षांपूर्वीच्या काळात घरातली भांडीकुंडी, कपडे वगैरे मोजके जिन्नस सोडले तर घरी येणारे बहुतेक सर्व पदार्थ निसर्गनिर्मित असत. आज शहरांमधल्या घरात कृषिउत्पादनेसुध्दा त्यांवर प्रक्रिया करून येतात. या बदलाच्या मुळाशी वीज आणि पाणी यांची सुलभ उपलब्धता आहे.

पाणीपुरवठा आणि पाण्याचे वहन, अभिसरण वगैरे कामांसाठी मुख्यत्वे सेंट्रिफ्यूगल पंपच वापरले जातात. पाण्याचा दाब आणि प्रवाह यांच्या गरजेनुसार योग्य त्या प्रकाराची आणि आकाराची निवड केली जाते. पण अनेक प्रकारच्या इतर द्रवपदार्थांसाठी मात्र पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंपांचा उपयोग करणे सोयीचे असते, कांही ठिकाणी ते आवश्यक असते. पाण्याच्या मानाने यातला प्रवाह अगदीच कमी असतो, पण काही यंत्रांमध्ये त्यांचा दाब प्रचंड प्रमाणात वाढवला जातो. रसायने, औषधे, खनिज तेले, गळित पिकांपासून काढलेली खाद्य किंवा अखाद्य तेले, चरबी, मध, ग्रीस, क्रीम, मलम, पेस्ट, जॅम, मोरंबे, केचअप, सॉस यासारख्या अनंत वस्तूंचे उत्पादन किंवा त्यांच्यावर प्रक्रिया करणा-या कारखान्यांमध्ये या वस्तू एका पात्रामधून दुस-या पात्रांत नेण्यासाठी आणि अखेर डबे, बाटल्या, कॅन्स वगैरेंमध्ये भरण्यासाठी लहान मोठ्या आकारांच्या आणि निरनिराळ्या प्रकारच्या पंपांचा उपयोग होतो. आपल्या घरातली कोणतीही वस्तू घेतली आणि ती बनवणा-या कारखान्याला भेट दिली तर आपल्याला त्या जागी कोणता ना कोणता पंप दिसणारच. इतके आपले जीवन पंपांवर अवलंबून गेले आहे. निरनिराळ्या प्रकारचे पंप चालवतांना येणारे अनुभव आणि अडचणी हा एक वेगळा आणि गहन विषय आहे. पुढे मागे शक्य झाले तर तिस-या खंडात त्याबद्दल लिहिण्याचा मानस व्यक्त करून हे पंपपुराण इथे संपवत आहे.

इति पंपपुराणः।