Saturday, June 29, 2013

बिनतारी संदेशवहन (उत्तरार्ध)

सागरी प्रवासाप्रमाणेच हवाई प्रवासातसुध्दा कोणालाही कसलाही निरोप पाठवण्यासाठी बिनतारी संदेश हाच एक मार्ग असतो. आकाशामधून विमानतळावर विमान उतरवण्यासाठी तिथल्या यंत्रणेला तयार रहायला सांगणे आवश्यक असते. विमानांची संख्या वाढत गेल्यानंतर विमानतळावरील रहदारीचे नियंत्रण करण्याची गरज पडू लागली आणि आता तर कुठलेही विमान एकाद्या विमानतळाजवळ आले की त्याने आभाळातसुध्दा कशा घिरट्या घालायच्या हे ग्राउंड कंट्रोलवालेच ठरवतात आणि तसे आदेश वैमानिकाला देत राहतात. पन्नास वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा मुंबईचे विमानतळ पाहिले तेंव्हा तिथल्या मैदानात फिरत असलेले काही गणवेशधारी लोक हातात धरलेले एक उपकरण कानाला लावून सारखे काही तरी बोलतांना दिसले. त्यांच्याकडे असलेला वॉकीटॉकी सेट मी त्यावेळी पहिल्यांदा पाहिला. तोपर्यंत मी साध्या टेलिफोनवरसुध्दा कोणाशी कधी बोललेलो नव्हतो. त्यामुळे विमानतळावरल्या लोकांकडचे अजब उपकरण पाहून माझ्या आश्चर्याला पारावार उरला नव्हता. आताचा मुठीत मावणारा चिमुकला सेल फोन आणि अँटेनाची लांब शेंडी असलेला त्या काळातला हातभर लांबीचा वॉकीटॉकी सेट यांची मनातल्या मनात तुलना करतांना हसू येते.

बिनतारी संदेशवहनाचा भरपूर उपयोग सैन्यदलामध्ये केला जातो. सीमेवरील सैनिकांना मागे असलेल्या छावणीशी तसेच एकमेकांशी सतत संपर्कात राहणे आवश्यक असते. दर इतक्या लढवय्यांमागे एक संपर्क साधणारा असे काही प्रमाण ठरवले जाते आणि तितके सिग्नलमेन ठेवले जातात. याचा सराव करण्यासाठी शहरात असतांनासुध्दा वायरलेस कम्युनिकेशनचा उपयोग केला जातो. मागे काही काळासाठी आमच्या घराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत एक लश्कराची छावणी ठेवली होती. त्या काळात दिवसरात्र अधून मधून आमच्या टीव्हीवर अचानक एक प्रकारची खरखर सुरू होत असे आणि काही काळ ती चालत असे. टीव्हीच्या सगळ्या प्रकारच्या तपासण्या करून त्यात काही बिघाड सापडला नाही. शेजारीपाजारी चौकशी करता त्यांनासुध्दा असाच अनुभव येत होता. त्या वेळी आकाशसुध्दा निरभ्र असायचे. त्यामुळे हा डिस्टर्बन्स कुठून येतो ते काही समजत नव्हते. पुढे ती छावणी उठली आणि हा प्रॉब्लेमही नाहीसा झाला, तेंव्हा त्याचे कारण लक्षात आले. 

युरोपच्या सफरीमधल्या व्हॅटिकन सिटीमध्ये आम्ही फिरत होतो त्या वेळी त्या भागात निरनिराळ्या देशांमधल्या पर्यटकांचे निदान शंभर तरी घोळके फिरत होते आणि त्यांचे एकमेकांमध्ये थोडे मिसळणे अपरिहार्य होते. आमच्या ग्रुपमधल्या प्रत्येकाला कानावर बसवायचे एक उपकरण (हेडफोन) दिले होते आणि आमचा गाईड प्रत्येक ठिकाणची माहिती आणि पुढे जाण्याच्या सूचना त्यावर देत होता. यामुळे प्रत्येकाला सगळी माहिती चांगली ऐकू येत होती आणि एकत्र राहण्याला मदत मिळत होती. युरोपअमेरिकेतल्या काही ठिकाणी तिथली स्थळे किंवा त्यांवरील प्रेझेंटेशन्स पाहण्यासाठी प्रत्येक प्रेक्षकाला एक बिनतारी हेडफोन दिला होता आणि आपल्याला हव्या असलेल्या भाषेमधली कॉमेंटरी त्यातून ऐकण्याची सोय होती.

मी एकदा कोलकात्याच्या उपनगरातल्या एका कारखान्यात गेलो होतो, त्या काळात तिथली दूरध्वनिसेवा इतकी खराब आणि बेभरंवशाची होती की त्या कंपनीने कारखाना आणि हेड ऑफीस यांच्या दरम्यान थेट संपर्क साधण्यासाठी खासगी वायरलेस सेट बसवला होता. आमच्या ऑफीसातही बिनतारी संपर्कयंत्र बसवले  होते. भारतातल्या दूरवरच्या दुर्गम भागांमध्ये असलेल्या आमच्या प्लँट्स आणि प्रॉजेक्टसाइट्सवर काम करणा-या सहका-यांशी आम्ही त्यावर संभाषण करत असू. एसटीडीची सेवा सगळीकडे उपलब्ध होण्यापूर्वीच्या त्या काळात तेवढा एकच मार्ग आम्हाला उपलब्ध होता. पण हे वायरलेसवरले बोलणे सोपे नसायचे. टेलीफोनप्रमाणे त्यावर एकाच वेळी दोन्ही बाजूंनी संदेश पाठवले जात नसत. आपण एक वाक्य बोलून 'ओव्हर' असे म्हणायचे आणि एक बटन दाबून धरायचे, त्यानंतर पलीकडचा माणूस उत्तर देऊन 'ओव्हर' म्हणेल तेंव्हा ते बटन सोडून दुसरे दाबायचे आणि पुढले वाक्य बोलायचे अशी थोडी कसरत करावी लागत असे. त्यातसुध्दा खराब हवामान, सूर्यावरली चुंबकीय वादळे वगैरेंमुळे खूप डिस्टर्बन्स येत असे. आणि त्या सगळ्यावर मात करून आपले काम झाल्याचे समाधान मिळवायचे असे.

अनेक वर्षांपासून अशा प्रकारे विशिष्ट कारणांसाठी वायरलेस कम्युनिकेशनचा उपयोग होत होता. त्याच्या तंत्रज्ञानात प्रगती होत गेली आणि तो उपयोग वाढत गेला. सुरुवातीला बरीच वर्षे मुंबईमध्ये फक्त स्थानिक दूरदर्शन दिसत असे. निरनिराळी केंद्रे बिनतारी यंत्रणांमधून एकमेकांशी जोडली गेली आणि मल्टिचॅनल टीव्ही सुरू झाला. पूर्वीच्या काळच्या वर्तमानपत्रांच्या निरनिराळ्या गावामधील वार्ताहरांनी दिलेल्या बातम्या टेलिप्रिँटरमधून मुख्य कार्यालयाकडे जात असत आणि आणि दूरदेशीची छायाचित्रे रेडिओफोटोद्वारे तिकडे येऊन ती छापून येत असत. वृत्तपत्रीय क्षेत्रामधल्या संदेशवहनामध्ये काळानुसार सतत वाढ होत गेली. आता तर एकेका वर्तमानपत्रातला सगळाच मजकूर बिनतारी यंत्रणांमार्फत ठिकठिराणी पाठवला जातो आणि ठिकठिकाणच्या स्थानिक आवृत्यांमध्ये त्या ठिकाणच्या छापखान्यांमध्येच छापला जातो. अनेक वर्षे अस्तित्वात असलेली स्थानिक आवृत्ती आणि डाक एडिशन अशा निरनिराळ्या आवृत्या आता सहसा कुठे दिसत नाहीत.

गेल्या काही दशकांमध्ये अंतराळविज्ञानामधले (स्पेस सायन्स) संशोधन आणि बिनतारी संदेशवहन यांनी हातात हात धरून एकमेकांच्या आधाराने प्रचंड प्रगती केली. अग्निबाण (रॉकेट) उडवण्याचा एकादा शास्त्रीय प्रयोग केल्यापासून कुठल्याही क्षणी तो आकाशात किती उंचावर आणि नेमक्या कोणत्या जागी आहे आणि किती वेगाने कोणत्या दिशेने पुढे जात आहे वगैरे सविस्तर माहिती मिळवण्यासाठी त्या रॉकेटसोबतच अत्यंत प्रभावी आणि वेगवान असे प्रक्षेपक (ट्रान्मिटर्स) पाठवणे, तसेच त्यांनी पाठवलेली माहिती समजून घेण्यासाठी अत्यंत संवेदनशील अशी अनेक उपकरणे जमीनीवर जय्यत तयार असणे आवश्यक असते. हा अग्निबाण वातावरणानधून वेगाने वर झेपावत असतांनाच आजूबाजूच्या वातावरणाची माहिती गोळा करून पाठवणारी उपकरणेसुध्दा त्याच्यासोबत पाठवली जातात. हे रॉकेट पृथ्वीपासून दूर जात असतांना सभोवतालच्या वातावरणामधला हवेचा दाब आणि तपमान कमी होत जाते, पण अग्निबाणाच्या उडण्याच्या वेळी निर्माण होणारी प्रचंड धग, तसेच हवेच्या घर्षणामुळे निर्माण होणारी ऊष्णता यांचाही परिणाम त्या रॉकेटसोबत पाठवलेल्या प्रत्येक उपकरणावर होत असतो. अशा प्रकारे त्यांना अत्यंत कठोर परिस्थितींमध्ये तग धरून कार्य करत रहायचे असते. यात वापरली जाणारी प्रत्येक वस्तू खास प्रकारच्या पदार्थापासून तयार करावी लागते. अमेरिकेतली नासा आणि रशियामधली तत्सम संस्था यांनी अब्जावधी डॉलर्स किंवा रुबेल्स खर्च करून जगभरातल्या प्रयोगशाळांमध्ये संशोधन करवले आणि त्यामधून अनेक नवनवीन मिश्रधातू तसेच मानवनिर्मित पदार्थ तयार करवून घेतले. या संशोधनामधून शिकत आणि नवनवे प्रयोग करून सुधारणा करत खूप लांब पल्ल्याची मोठमोठी रॉकेट्स तयार केली गेली. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून दूर निघून जाणारे अग्निबाण उडवण्याची किमया साध्य झाल्यानंतर पृथ्वीसभोवती घिरट्या घालत राहणारे कृत्रिम उपग्रह तयार करून अशा रॉकेट्सच्या सहाय्याने त्यांना अवकाशात धाडण्यात आले.

अवकाशसंशोधनाच्या बदलत जाणा-या तंत्रज्ञानासोबत संदेशवहनातही अद्ययावत सुधारणा करून अंतरिक्षात भ्रमण करणा-या उपग्रहांबरोबर सतत संपर्क ठेवणेही अगत्याचे होते. त्यासाठी उपग्रहावर कुशल आणि विश्वासार्ह असे प्रक्षेपक ठेवले गेले, तसेच त्यांना चालवण्यासाठी लागणारी ऊर्जा सूर्यप्रकाशातून मिळवण्याची सोय केली गेली. सुरुवातीला शास्त्रज्ञांच्या गरजेसाठी तयार झालेल्या या तंत्रज्ञानाचा सामान्य जनतेला कसा लाभ होऊ शकेल याचाही विचार करण्यात आला. त्यासाठी जास्तीचे वेगळे ट्रान्स्मिटर्स व रिसीव्हर्स उपग्रहावर बसवून ते जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आले. टेलिव्हिजन, टेलीफोन, इंटरनेट यासारख्या सेवांसाठी आवश्यक असलेले संदेशवहन त्यामधून करता येऊ लागले. या संदेशांच्या लहरी सरळ रेषेमध्ये प्रवास करत असल्यामुळे आणि पृथ्वीचा आकार गोल असल्यामुळे जमीनीवर त्या फार जास्त अंतरावर जात नाहीत, पण उपग्रहावरून पृथ्वीचा मोठा भाग सरळ रेषेत येत असल्यामुळे ते प्रसारण खूप मोठ्या प्रदेशात पसरले जाते. या कारणामुळे उपग्रहामार्फत होणारे संदेशवहन अनेकपटीने प्रभावशाली ठरले. अर्थातच हे सगळे पूर्णपणे बिनतारी असते.

अग्निबाण आणि उपग्रह यांत वापरण्यात येणारी प्रत्येक वस्तू आकाराने आणि वजनाने लहानात लहान असणे अत्यंत आवश्यक असते. या दृष्टीने संशोधन करून प्रत्येक उपकरणामधला प्रत्येक भाग किती सूक्ष्म करता येईल यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. या मिनिएचरायझेशनमुळे इलेक्ट्रॉलिक्सच्या बाबतीत कल्पनातीत फरक पडले. व्हॉल्व्ह्सच्या जागी सेमिकंडक्टर्स, त्यांच्या अनेक एलेमेंट्सना जोडणारे प्रिंटेड सर्किट बोर्ड्स, अनेक पीसीबी मिळून इंटिग्रेटेड सर्किट्स वगैरे पाय-या एकामागोमाग पार करून अत्यंत सक्षम पण आकाराने चिमुकली उपकरणे तयार होत गेली. हाताच्या मुठीत मावतील एवढे लहान पण अनेक कामे करू शकणारे सेलफोन हे याचे उदाहरण आहे. गंमत म्हणजे या प्रगतीबरोबर नवनव्या उपकरणांच्या किंमतीही कमी कमी होत गेल्या. वाढत्या महागाईच्या काळात हा एकमेव अपवाद म्हणता येईल.

सेलफोन आल्यानंतर तर संदेशवहनात क्रांतिकारक बदल झाले. आज आपल्याला घरात, ऑफिसात, रस्त्यात किंवा जिथे कुठे असू तिथून सातासमुद्रापलीकडे असलेल्या व्यक्तीशी बोलता येते, तसेच लेखी निरोप पाठवता येतात, चित्रेसुध्दा पाठवता येत असल्यामुळे आपण त्याच्या चेह-यावरले भाव पाहू शकतो. महाभारतातल्या संजयाला या प्रकारच्या दिव्य शक्तीचे एकतर्फी वरदान मिळाले होते, तो फक्त दूरचे पाहू किंवा ऐकू शकत होता, इतर अनेक ऋषीमुनिवर्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली होते असे सांगतात. पण आजच्या तंत्रज्ञानाने सर्वसामान्य मर्त्य मानवांना कसलीही तपश्चर्या न करता हे प्राप्त झाले आहे. कोणत्याही खास सोयी म्हणजे एका काळी फक्त अतिविशिष्ट व्यक्तींची मक्तेदारी असायची. आता इतक्या चांगल्या सोयी कुणाच्याही खिशाला परवडणा-या किंमतीत उपलब्ध झाल्या आहेत.  बिनतारी संदेशवहनाने आता आपले जग लहान झाल्यासारखे, जवळ आल्यासारखे वाटायला लागले आहे.


.  . . . . . .  . . . . . .. . . .. . . ...  (समाप्त) 

Friday, June 28, 2013

बिनतारी संदेशवहन (पूर्वार्ध)

टेलिग्राफच्या सेवेची सुरुवात होऊन आता दीडशे वर्षे होऊन गेली. त्यातली जवळ जवळ सव्वाशे वर्षे तार हेच जलदगतीने संदेश पाठवण्याचे प्रमुख साधन होते. अलीकडच्या काळात बिनतारी संदेशवहन आपल्या अंगवळणी पडून आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनून गेले आहे. तार पाठवणे कालबाह्य झालेले असल्यामुळे ही ऐतिहासिक सेवा आता कायमची बंद होऊन या पिढीसोबत विस्मरणात जाणार आहे.

एका विद्युतचुंबकाच्या (इलेक्ट्रोमॅग्नेट) सभोवती विजेचा प्रवाह सोडला की लोखंडाचा एक दांडा थोडा उचलला जातो आणि बंद केला की गुरुत्वाकर्षणाने तो खाली येऊन एका पट्टीवर आदळून नाद निर्माण करतो. या तत्वावर आधारलेली सुरुवातीच्या काळातली तारायंत्रे त्या काळात क्रांतिकारी होती, पण त्यांची रचना सुटसुटीत होती. याच तत्त्वावर तयार केलेल्या एका यंत्रामध्ये एक काटा डायलवर पुढे किंवा मागे फिरत असे तर आणखी एका यंत्रातल्या कागदाच्या पट्टीवर  .  (डॉट) किंवा - (डॅश) उमटवत असे. एका युरोपियन शास्त्रज्ञाने तयार केलेल्या यंत्रामधला दांडा (रॉड) त्याने एका रसायनात बुडवून ठेवला होता, त्यातून विजेचा प्रवाह सोडला की हैड्रोजन वायूचा बुडबुडा निघत असे. अशा प्रकारच्या खुणांमधून कोणता अर्थ काढायचा याची एक परिभाषा निश्चित केली जात असे. त्यातले मोर्स कोड हे सर्वमान्य झाले आणि जगभरातले लोक त्याचा वापर करू लागले.

नंतरच्या काळात विज्ञानाच्या सगळ्याच क्षेत्रांमध्ये वेगाने प्रगती होत गेली. इंग्रजी मुळाक्षरांचे मोर्सकोडमध्ये आणि मोर्सकोडमधल्या खुणांचे पुन्हा एबीसीडीमध्ये रूपांतर करण्याचे काम यंत्रांद्वारा होऊ लागले आणि त्यातून टेलिप्रिंटर तयार झाला. दांडा आणि पट्टी याऐवजी एक थरथरणारा पडदा लावला तर त्यामधून निरनिराळे आवाज काढता येतात हे पाहून मानवी आवाज काढू शकणारे स्पीकर तयार झाले आणि त्यांचा उपयोग करून निर्माण केलेल्या टेलिफोनने एक नवा अध्याय सुरू केला. टेलीफोनमुळे संभाषण करणे शक्य होत असल्यामुळे त्याचा प्रसार वेगाने झाला, पण हे संभाषण फक्त मौखिक स्वरूपाचे असते. ते स्पष्टपणे ऐकू गेले नाही किंवा ऐकणा-याने समजण्यात काही चूक केली तर त्यावर उपाय नसतो आणि ते तपासून पाहणे अशक्यप्राय असते. टेलिग्रॅममधला संदेश लेखी असल्यामुळे तो पुन्हा पुन्हा वाचता येतो, तिस-या माणसाला दाखवता येतो, रेकॉर्डमध्ये ठेवता येतो, त्याची प्रत काढता येते वगैरे फायदे त्यात असल्यामुळे ऑफीशियल कामांसाठी टेलिग्रॅम, टेलीप्रिंटर, टेलेक्स वगैरेंवरच सर्वांची भिस्त राहिली.

या सगळ्या संदेशवहनासाठी तारांमधून जाणारा विजेचा प्रवाह हेच माध्यम असायचे. पण वातावरणामधून किंवा निर्वात पोकळीमधूनसुध्दा विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्म लहरी प्रकाशाच्या वेगाने दूरवर प्रवास करतात याचा शोध लागला आणि तशा प्रकारच्या लहरी उत्पन्न करणे तसेच ग्रहण करणे यावर नियंत्रण करता आल्यानंतर बिनतारी संदेशवहनाची सुरुवात झाली. या माध्यमामधूनसुध्दा सोपे संदेश पाठवणे सुलभ असल्यामुळे याचा उपयोगसुध्दा आधी टेलिग्रॅम पाठवण्यासाठी झाला. अशा प्रकारची पहिली 'बिनतारी' 'तार' पाठवूनसुध्दा शंभर वर्षांहून जास्त काळ लोटला आहे हे कदाचित कोणाला फारसे ठाऊक नसेल.  'बिनतारी' दूरध्वनि संदेश पाठवायला त्यानंतर वीस पंचवीस वर्षे लागली. रेडिओ वेव्ह्जचा हा उपयोग करणे खूप खर्चाचे आणि कठीण असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला ते परवडणारे नसावे, यामुळे त्याचा सार्वजनिक प्रसार हळूहळू झाला.

तारांमधून जाणारी वीज त्या तारेच्या एका टोकापासून निघून तिला जोडलेल्या तारांमधून ठराविक सर्किटमध्येच वाहते, पण प्रसारणकेंद्रामधून निघालेल्या रेडिओ लहरी चहूदिशांना पसरत जातात. यामुळे त्यांचा चांगला उपयोग आकाशवाणीसाठी केला गेला आणि जगभरातल्या महानगरांमध्ये रेडिओ स्टेशन्स सुरू झाली आणि त्यांच्यावरून झालेले प्रसारण घरोघरी बसलेले लोक ऐकू लागले. रेडिओलहरींचा हाच उपयोग बहुतेक लोकांना माहीत असतो. यात आणखी प्रगती झाल्यानंतर दूरचित्रवाणी (टीव्ही) सुरू झाली.

सार्वजनिक जीवनात बिनतारी संदेशवहनाचा असा उपयोग होत असला तरी काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये त्याचा उपयोग निरोप पाठवण्या आणि घेण्यासाठी होत राहिला. समुद्रात सफर करणारी जहाजे एकमेकांशी वायरलेसवर संपर्क करू लागली. त्या काळातला एक मजेदार किस्सा असा आहे. एकदा रात्रीच्या वेळी एका जहाजाचा कप्तान स्वतःच निरीक्षण करत असतांना त्याला दूर एक दिवा दिसला आणि तो थेट आपल्याच दिशेने येत आहे असे वाटल्याने त्याने संदेश पाठवला, "ताबडतोब १० अंश उजवीकडे वळ."
उत्तर आले, "तुझे जहाजच ताबडतोब १० अंश उजवीकडे वळव."
"तू माझे ऐक. मी कॅप्टन बोलतो आहे"
"तू माझे ऐक. मी ऑपरेटर बोलतो आहे"
"माझे लढाऊ जहाज आहे, माझ्याकडे दहा तोफा आणि वीस आगबोटींना बुडवता येईल इतका दारू गोळा आहे. जिवाची पर्वा असेल तर मुकाट्याने तुझे जहाज वळव."
"तुला काय करायचे असेल ते कर (आणि मसणात जा). मी दीपस्तंभावर बसलो आहे."
(मूळ कल्पना रीडर्स डायजेस्टवरून)

.  . . . . . . . . .  . . . . . (क्रमशः)

Sunday, June 23, 2013

तार (टेलिग्रॅम)

तार (टेलिग्रॅम) (पूर्वार्ध)

दिवाळीच्या फटाक्यांमध्ये फुलबाजांना एक महत्वाचे स्थान असते. लोखंडाच्या एका जराशा कडक तारेला सगळ्या बाजूने शोभेची दारू चिकटवून फुलबाज्या तयार करतात. एकादा मोठा माणूस किंवा मुलगा आधी फुलबाजी पेटवतो आणि लहानग्याच्या हातात देतो. ते मूल बिचकत बिचकत त्या तारेचे टोक आपल्या चिमुकल्या चिमटीत पकडते हे दृष्य आपण दर दिवाळीला पाहतो. कुठल्याही प्रकारच्या तारेचा पहिला स्पर्श आणि 'तार' या शब्दाशी माझी ओळख सर्वात आधी अशीच झाली असावी. लहानपणी इतर काही तारासुध्दा माझ्या पहाण्यात आल्या होत्या. त्या काळात नायलॉनच्या दोऱ्या नसायच्या, कपडे वाळत घालण्यासाठी छताला दांड्या (आडव्या काठ्या) टांगून ठेवलेल्या असत आणि कपडे उन्हात वाळवण्यासाठी गच्चीवर तात्पुरत्या तारा बांधत. वीज वाहून नेण्यासाठी अंडरग्राउंड केबल्स नव्हत्या. रस्त्यावर थोड्या थोड्या अंतरावर विजेचे खांब उभारलेले असायचे आणि एका खांबावरून दुसऱ्या खांबावर अशा विजेच्या तारा नेलेल्या असत. आमच्या घराजवळच्या खांबावरून दोन तारा आमच्या घरात आणल्या होत्या आणि घरातल्या वायरिंगच्या जाळ्याला त्या जोडल्या होत्या. इलेक्ट्रिशियन (त्या काळात त्याला वायरमन म्हणत) सोडून अन्य कोणीही त्या तारांना स्पर्श करण्याचे धाडस करत नसे आणि कोणी हा वेडेपणा केलाच तर त्याला त्याची केवढी मोठी किंमत द्यावी लागली याच्या गोष्टी घोळून घोळून सांगितल्या जात असत. रस्त्यावर खेळ दाखवणारे डोंबारी लोक दोन बाजूला दोन तिगाडी ('ए फ्रेम्स') उभ्या करून त्याला एक तार बांधायचे आणि त्या तारेवर तोल सांभाळून कौशल्यपूर्ण कसरत करून दाखवायचे. त्यावरूनच 'तारेवरची कसरत' हा वाक्प्रचार निघाला. भजनाच्या आणि गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये वीणा, तंबोरा, सतार, व्हायलिन अशा प्रकारची तंतूवाद्ये हमखास दिसत असत आणि त्यांच्या तारांना छेडून पहाण्याची अनावर उत्सुकता वाटत असे, पण तशी संधीही मिळत नसे आणि धीरही होत नसे. अशा प्रकारे 'तार' ही वस्तू अनेक रूपाने भेटत असली तरी 'तार' या शब्दाचा एक महत्वाचा अर्थ मला बराच काळ कळला नव्हता. 

मी सात आठ वर्षाचा असतांना एकदा सकाळी एक पोस्टमन आमच्या घरी आला. आमचा नेहमीचा पोस्टमन थोडा वयस्क होता आणि तो दुपार टळून गेल्यानंतर हळू हळू चालत डुलत येत असे. पण सकाळी उजाडताच आलेला हा तरुण पोस्टमन वेगळा होता आणि सायकलवर बसून घाईघाईत आला होता. त्याला पाहून मी त्याच्याकडून पत्रे घेण्यासाठी दारात गेलो तेंव्हा त्याने मला घरातल्या कोणा मोठ्या माणसाला बोलावून आणायला सांगितले. अत्यंत गंभीर मुद्रेने काही सांगून त्याने आपल्या हातातला लिफाफा दिला. शाळेत जाऊन इंग्रजी शिकलेल्या घरातल्या कोणी तरी त्यातला मजकूर वाचून त्याचा अर्थ सांगितला आणि घरात एकच हलकल्लोळ माजला. आमच्या घरातली रडारड ऐकून शेजारी धावत आले, त्यांनी जाऊन गावात रहात असलेल्या आमच्या इतर नातेवाईकांना ही बातमी सांगितली आणि ते सुध्दा धावत आले. मला कोणी काही सांगत नव्हते आणि तो भयाण गोंधळ पाहता काही विचारायचा धीर होत नव्हता. "आपले महादेवराव गेले अशी 'तार' आली आहे." असे कानावर आले. त्यातल्या 'गेले' याचा अर्थ थोडासा समजला, पण त्याचे कोणते गंभीर परिणाम होणार आहेत हे समजण्याचे माझे वय नव्हते. ही कसली 'तार' आणि कुठे आली आहे, हे मात्र काही लक्षात येत नव्हते. पोस्टमनने तर एक पाकिट दिले होते आणि त्यात चतकोर कागद होता. याचा कुठल्या तारेशी कसला संबंध होता?

माझ्या मोठ्या भावाने त्याच्या माहितीनुसार याचा थोडा उलगडा केला. नेहमीची पत्रे आधी कोणीतरी हाताने लिहितो, त्याच्या गावातल्या पोस्टात टाकतो, तिथून रेल्वे, बस वगैरेमधून प्रवास करून ती आपल्या गावातल्या पोस्टात येतात आणि मग आपला पोस्टमन ती आपल्याला आणून देतो. यात काही दिवस जातात. पण तार म्हणजे टेलिग्रॅममधला मजकूर मात्र एका गावामधून दूरवरच्या दुसऱ्या गावातसुध्दा एका विशिष्ट यंत्रांमधून क्षणभरात येतो आणि इथला पोस्टमन तो एका वेगळ्या कागदावर लिहून आपल्याला आणून देतो. त्यामुळे आपल्याला तो अर्जंट निरोप लगेच समजतो. यामुळे आत्ता तासाभरापूर्वी बाहेरगावाहून केलेली ही तार आपल्याला लगेच मिळाली.  त्या गावापासून आपल्या गावापर्यंत एक प्रकारची तार जोडलेली असते, तिच्यातून हा निरोप आपल्याकडे आला म्हणून त्याला 'तार' असे म्हणतात.

त्यानंतर मी जेंव्हा जेंव्हा पोस्ट कार्डे, पाकिटे, तिकीटे वगैरे आणण्यासाठी पोस्ट ऑफीसात जात असे तेंव्हा इतर खिडक्यांकडे लक्ष देऊन पहात होतो. तार पाठवण्यासाठी एक वेगळी खिडकी होती. तिथे कधी गर्दी असायची नाही. एकादा माणूस तिथे आला तर तो एक फॉर्म मागून घेऊन आणि तो भरून देत असे आणि त्यात काय किंवा किती लिहिले आहे हे वाचून त्याप्रमाणे तिथला क्लार्क तार पाठवण्याचा चार्ज मागत असे. खिडकीच्या आतल्या बाजूला एक यंत्र होते. अधून मधून कधीतरी त्यातून कड कट्ट कडकट्ट असे आवाज येत असत आणि एक माणूस लक्ष देऊन तो आवाज ऐकून काही तरी लिहून घेत असे. हळूहळू या सगळ्या निरीक्षणांचा अर्थ समजत गेला. मोर्स नावाच्या शास्त्रज्ञाने डॉट् आणि डॅश या दोनच चिन्हांचा उपयोग करून एक सांकेतिक लिपी तयार केली. विशिष्ट वेळा आणि विशिष्ट क्रमाने ही चिन्हे लिहिली की त्यातून ए, बी, सी डी यासारखे एक एक  अक्षर तयार होते आणि त्या अक्षरांमधून शब्द तयार करता येतात. डॉट् आणि डॅश या दोन चिन्हांच्या ऐवजी कड आणि कट्ट अशा दोन आवाजांमधून तशीच अक्षरे तयार करता येतात. पूर्वीच्या काळातल्या तारायंत्रांमध्ये एक विजेचा लोहचुंबक आणि वर खाली होणारा लहानसा हातोडा असे. त्या लोहचुंबकाला गुंडाळलेल्या तारेमधून विजेचा प्रवाह नेला आणि तो बंद केला तर तो हातोडा वर खाली होऊन खाली ठेवलेल्या पट्टीवर आदळून ध्वनि निर्माण करत असे. विजेचा प्रवाह सुरू किंवा बंद करण्यासाठी एक बटन असे. ते कमी किंवा जास्त वेळ दाबून दोन निरनिराळे ध्वनि उत्पन्न केले जात. निरोपात जी अक्षरे असतील त्याप्रमाणे हे ध्वनि तयार करून एका बाजूच्या यंत्रामधून पाठवले की दुसऱ्या बाजूला ठेवलेल्या यंत्रामध्ये तसेच आवाज निघत आणि त्या ठिकाणी बसलेला ऑपरेटर ते आवाज ऐकून त्यांचे रूपांतर अक्षरांमध्ये करत असे. हा निरोप कोणाला द्यायचा आहे त्या माणसाचे नाव, गाव आणि पत्ता वगैरेसुध्दा अशाच प्रकारे सांकेतिक खुणांमधून पाठवले जाई. ते पाहून त्या गावातला पोस्टमन ते पत्र (तार) त्या माणसाच्या घरी नेऊन देत असे. या कामासाठी एक वेगळा पोस्टमन ठेवलेला असे. तो ही तार त्वरेने पोचती करत असे.

अशा प्रकारचा पहिला प्रयोग अमेरिकेत यशस्वी करून दाखवला गेल्यानंतर दहा वर्षांच्या कालावधीतच ब्रिटिशांनी हे तंत्रज्ञान भारतामध्ये आणले आणि कोलकाता, मुंबई, पेशावर, चेन्नै यासारख्या दूरवर असलेल्या शहरांना जोडणारे तारांचे जाळे पसरवले. भारतासारख्या विशाल देशाच्या कानाकोपऱ्यामधील ठिकाणांबरोबर संपर्क ठेवण्यासाठी तारायंत्रांचा खूप उपयोग होऊ शकेल हे त्यांनी ओळखले असणार. म्हणजे तार किंवा टेलिग्रॅम आता दीडशे वर्षांहून जुने झाले आहे. ज्या काळात ही सेवा सुरू झाली होती तेंव्हा विजेचे उत्पादन आणि वितरण सुरू झालेले नव्हते. टेलिग्रॅम पाठवण्यासाठी आवश्यक असणारी वीजसुध्दा त्या यंत्रामध्येच तयार करायची व्यवस्था होती. त्यासाठी हाताने एक चक्र फिरवून वीजनिर्मिती करण्यासाठी एका डायनॅमोचा समावेश त्यात होता. अशा प्रकारची स्वयंपूर्ण यंत्रे माझ्या लहानपणी मीसुध्दा पाहिली आहेत. अनेक लहान रेल्वेस्टेशनांमध्ये विजेचे दिवे नसले तरी तारायंत्रे असत आणि हँडल मारून ती सुरू केली जात.
 . . . . . . . . .  . . . . . . . . . .

तार (टेलिग्रॅम) (उत्तरार्ध)

वीजवाहक तारेप्रमाणेच पोस्टाने आलेली तारसुध्दा नेहमी जबरदस्त शॉक देते असा माझ्या आधीच्या पिढीमधील लोकांचा अनुभव होता. त्यामुळे 'तार' या शब्दाची एक प्रकारची दहशत असायची. पुलंच्या शब्दात सांगायचे झाल्यास त्या काळातल्या 'उघड्या दारवाजांच्या संस्कृतीत' तार घेऊन येणारा पोस्टमन जर एकादे वेळी गल्लीत शिरला तर त्या आळीतल्या सर्व लोकांना तो येतांना दिसत असे आणि त्याला पाहून सर्वांचे कान टवकारले जात. यमदूताचा अवतार वाटणारा तो माणूस ज्या घरात शिरे तिथे राहणाऱ्या लोकांची घाबरगुंडी उडत असे. मागील भागात जिचा उल्लेख झाला ती दुःखद वार्ता घेऊन आमच्या घरात आलेली तार पुन्हा एकदा त्या शब्दाबद्दलच मनात धडकी भरवून गेली. घरात कोणाचा टेलिग्रॅम येणे हा अगदी नेहमीचा अनुभव नसला तरी त्या घटनेच्या आधीसुध्दा इतर काही महत्वाचे संदेश असणाऱ्या तारा कदाचित आमच्या घरात आल्याही असतील, पण त्यातल्या मजकुराने घर ढवळून गेले नसेल, त्यामुळे त्याची बातमी आणि भीती लहान मुलांपर्यंत पोचली नसेल.

आजच्या मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या जमान्यात वाढलेल्या मुलांना कदाचित कल्पनाही करता येणार नाही पण पन्नास साठ वर्षांपूर्वीच्या त्या काळात लहान गावांमध्ये साधे टेलिफोन्स (लँडलाइन फोन) देखील पोचलेले नव्हते. कुठलाही संदेश कोणालाही शक्य तितक्या लवकर पाठवण्यासाठी तार हाच एकमेव पर्याय उपलब्ध होता, तोसुध्दा ज्या गावात पोस्ट ऑफीस असेल अशा मोठ्या गावांमध्येच. लहान खेड्यात राहणाऱ्या लोकांना तर तार करण्यासाठीसुध्दा जवळच्या मोठ्या गावात येऊन उत्तर मिळे पर्यंत तिथे रहावे लागत असे. तारेमधला सारा मजकूर खुल्लमखुल्ला असायचा. पाठवणाऱ्या पोस्टामधील कर्मचाऱ्याला तो मजकून वाचल्याशिवाय पाठवणे शक्य नव्हते आणि मोर्स कोडमधून त्याचे इंग्रजी लिपीत रूपांतर करण्याचे काम पोस्टामधला कर्मचारीच करू शकत असल्यामुळे त्यालाही तो समजत असे. अशा प्रकारे या यंत्रणेत काम करणाऱ्या सर्व लोकांना तारेमधला मजकूर समजत असल्यामुळे त्यात गुप्तता राखणे जवळ जवळ अशक्य होते. यातूनही मार्ग काढायचा असला तर "लठ्ठ माणूस आला, म्हातारा झोपला, पक्षी उडाला" अशासारखे सांकेतिक निरोप पाठवणारे पाठवत असतील आणि त्यावरून कोणते काम यशस्वीरीत्या झाले किंवा रखडले वगैरेचा बोध पलीकडच्या माणसाला होत असेल. पण असला निरोप फारच विचित्र असला तर त्याची आणि तो पाठवणाऱ्यांची जास्तच चर्चा होण्याची शक्यतासुध्दा असते.

मी नववी दहावीला येईपर्यंत परिस्थिती बरीच बदलली होती. तारेमधून पाठवल्या जाणाऱ्या संदेशांमध्ये विविधता आली होती. मलाही पोस्टामधून तार पाठवणे अवगत झाले होते. पत्ता आणि मजकूर यामधील शब्दांच्या संख्येप्रमाणे त्याचा चार्ज लागत असे. पैसे वाचवण्याच्या उद्देशाने संक्षिप्तपणे तार पाठवण्याची एक भाषा तयार झाली होती. पोस्टातले लोकसुध्दा त्यांना दिलेल्या मजकुरात (कदाचित त्यांचे काम वाचवण्यासाठी) काटछाट करून देत असत. A, An, The  यासारखे शब्द गाळून टाकले जात आणि is, was वगैरेंनाही फाटा दिला जात असे. संदर्भाप्रमाणे तारेमधला मजकूर वर्तमानकाळातला किंवा अगदी ताज्या भूतकाळातला आहे असे वाचक समजून घेत असे. आजकाल चॅटिंगसाठी तयार झालेली शॉर्टकटमधली भाषा वाचतांना मला पूर्वीच्या काळातली तारेची भाषा आठवते. मी पाठवलेल्या किंवा त्या काळात वाचलेल्या बहुतेच तारांमध्ये "ताबडतोब निघा", "अमक्या दिवशी येतो" किंवा "सुखरूप पोचलो" हाच मजकूर असायचा. "मुलगा झाला, मुलगी झाली, लग्नाची तारीख ठरली, अमूक तारखेला बारसे अथवा लग्न"  अशा आनंददायी बातम्यासुध्दा कधी कधी तारेमधून मिळत किंवा दिल्या जात. अशा तारा घेऊन येणारा पोस्टमन पेढे मागितल्याशिवाय रहात नसे.

नोकरदार मुलांना तडकाफडकी रजा मिळण्यासाठी तार हा पुरावा ग्राह्य मानला जात असे. त्यामुळे दिवाळीच्या सुमारास "अमूक तमूक सीरियस, स्टार्ट इमिजिएटली" अशा तारांच्या संख्येत खूप वाढ होत असे. महत्वाची परीक्षा द्यायला निघालेल्या मुलाला हार्दिक शुभेच्छा, परीक्षेमधले यश, लग्न, अपत्यप्राप्ती यासारख्या चांगल्या बातमीबद्दल अभिनंदन वगैरे संदेश तारेने पाठवून देण्याची प्रथा सुरू झाली. पोस्ट अँड टेलिग्राफ डिपार्टमेंटने अशा पंधरा वीस संदेशांची एक यादीच तयार करून त्यांना क्रमांक देऊन ठेवले होते. त्यातला क्र.४ किंवा १७ असा एक संदेश निवडून तो नंबर लिहून दिला तर त्याचा फक्त एकच शब्द मानला जाऊन तारेचा खर्च कमी होत असे आणि एका शब्दाच्या खर्चात आठ दहा शब्दांचा संदेश पाठवल्याचे समाधान तो पाठवणाऱ्याला मिळत असे. शिवाय अशा तारा छानशा रंगीत पाकिटांमधून पोचवल्या जात असत. तार घेऊन येणाऱ्या पोस्टमनबद्दल असलेले लोकांचे मत बदलण्यासाठी हा प्रयत्न केला गेला असेल.

दूरध्वनि किंवा टेलीफोनच्या प्रसाराबरोबर टेलिग्राफला उतरती कळा लागली असे जगभरात सर्वत्र झाले. तार हा एकतर्फी संदेश आहे. त्याचे उत्तर यायला वेळ लागतो. आणखी माहिती हवी असेल, शंका विचारायच्या असतील तर त्यांचे निरसन व्हायला आणखी वेळ लागतो. टेलिफोनवर दोन माणसे संभाषण करू शकतात, त्यांनी एकमेकांना सांगितलेले एकमेकांना समजले आहे की नाही हे त्यात समजते. एकमेकांशी विचार विनिमय करून ते काही ठरवू शकतात, योजना आखू शकतात, त्यांना एकमेकांचा आवाज ऐकायला मिळतो अशे अनेक फायदे असल्यामुळे दूरध्वनि हा तारेच्या मानाने असंख्यपटीने चांगला पर्याय आहे. त्याच्यापुढे तारेचा टिकाव लागणारच नाही. तार या माध्यमात फक्त एकच विशेष असा होता की त्यामधून एक लेखी पुरावा तयार होतो आणि कायदेशीर बाबींसाठी त्याचा उपयोग होतो. यामुळे टेलिफोनवरून बोलणे झाल्यानंतर टेलिग्रॅम, टेलेक्स वगैरेंमधून कन्फर्मेशन पाठवणे सुरू झाले होते.

मी लहान असतांना लहान गावांमध्ये टेलीफोन सेवा नव्हतीच. मोठ्या शहरांमध्ये ती अनेक वर्षांपूर्वीपासून चालत आलेली असली तरी फक्त ऑफिसे आणि उच्चभ्रू समाजापर्यंतच पोचली होती. एका शहरामधून दुसऱ्या शहरातल्या कोणाला टेलिफोन करायचा असल्यास ट्रंककॉल लावावा लागत असे आणि तो अत्यंत वेळखाऊ प्रकार असल्यामुळे अत्यावश्यक कामासाठी गत्यंतर नसेल तरच त्याचा उपयोग केला जात असे. कालांतराने एसटीडी आणि आयएसडी या सेवा सुरू झाल्यानंतर टेलिफोनमधला हा अडसर दूर झाला आणि जगभरात कोणाशीही संभाषण करणे सुकर झाले. त्याच काळात टेलिग्राफचा विकास होऊन टेलिप्रिंटर, टेलेक्स वगैरे त्याची नवी रूपे आली. या प्रकारांमध्ये कडकट्ट करणारी यंत्रे जाऊन त्यांच्या जागी टाइपरायटर्सनी घेतली. एका गावातल्या यंत्रामध्ये टाइप केलेला मजकूर दुसऱ्या गावामधल्या मशीनवर आपोआप उमटू लागला. इंग्रजी भाषेमधील अक्षरांचे मोर्स कोडमध्ये आणि त्याचे पुन्हा इंग्रजीमध्ये रूपांतर करण्याचे काम यंत्रांमध्ये होऊ लागले आणि त्यासाठी प्रशिक्षित तज्ज्ञ माणसांची आवश्यकता नाहीशी झाली. त्यामुळे टेलिफोनचा प्रसार झाल्यानंतरसुध्दा दोन तीन दशकेपर्यंत त्याच्यासोबतीला निरनिराळ्या प्रकारे टेलिग्रॅमचा उपयोगसुध्दा होत राहिला. टेलेक्सची यंत्रे ऑफिसांमध्येच बसवली जाऊ लागली. त्यांच्यायोगे चालणारे संदेशवहन थेट होत असल्यामुळे त्यासाठी पी अँड टी च्या मध्यस्थीची गरज राहिली नाही. पण घरगुती संदेशवहनासाठी ती परवडणे शक्य नसल्यामुळे तारेची आवश्यकता शिल्लक राहिली.

काँप्यूटर आणि इंटरनेटच्या प्रसारानंतर मात्र संदेशवहनात क्रांतीकारक बदल झाले. टेलिग्रॅम आणि टेलेक्समधून फक्त अक्षरे किंवा आकडे पाठवता येत होते, पण टेलिफॅक्समध्ये चित्र पाठवणे शक्य झाले. त्यामुळे ऑफिसेसमध्ये ते जास्त सोपे आणि प्रभावी तंत्र पॉप्युलर झाले. या तीन्ही माध्यमांसाठी विशिष्ट यंत्रसामुग्रीची गरज होती. पण इंटरनेटवरील ई मेलमधून टेक्स्ट, चित्रे आणि ध्वनिसुध्दा पाठवणे शक्य झाले. शिवाय त्यासाठी साधा पीसी पुरेसा असल्यामुळे कोणीही घरबसल्यासुध्दा ईमेल पाठवू शकू लागला. सेलफोनच्या तंत्रामध्ये झालेल्या क्रांतीनंतर संदेशवहन ही सामान्य माणसाच्या आवाक्यातली गोष्ट झाली. फोनवर बोलणे तसेच टेक्स्ट आणि इमेजेस पाठवणे हे सगळे काम खिशात मावेल एवढ्या लहानशा यंत्राद्वारे होऊ लागल्यानंतर अशी यंत्रे सर्वसामान्य माणसाकडे असु लागली. वॉट्सअॅपमुळे तर ते फारच सोपे आणि जलद होऊ लागले. त्यामुळे कोणीही कोणाशीही थेट संपर्क साधू लागला आणि कोणालाही संदेश पाठवण्यासाठी पोस्टात जाऊन तार करण्याची गरजच उरली नाही.

माझ्या लहानपणी आमच्या गावात तरी 'तार' हा त्वरित संदेश पाठवण्याचा एकमेव मार्ग होता, खेड्यांमध्ये तोसुध्दा नव्हता. चाळीस वर्षांपूर्वी मी मुंबईला आलो तेंव्हा इतर मार्ग उपलब्ध होऊ घातलेले असले तरी टेलिग्राफला खूप महत्व होते. मुंबईच्या फोर्ट विभागात सेंट्रल टेलिग्राफ ऑफीस नावाची मोठी इमारत होती (अजूनही असेल) आणि ती सदोदित गजबजलेली असायची. पण काळाच्या ओघात तारेचे महत्व कमी होत होत आता शून्याच्या जवळपास आले असल्याकारणाने ही सेवा कायमची बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी एकादी महत्वाची सेवा कधीकाळी अस्तित्वात होती हेसुध्दा पुढच्या पिढ्यांना कदाचित समजणार नाही.



Thursday, June 06, 2013

क्रिकेट क्रिकेट - भाग १ ते ४


मी कधीच खास अंगात ड्रेस घालून, डोक्यावर कॅप चढवून आणि पायाला पॅड्स, हातात ग्लोव्ह्ज वगैरे जामनिमा करून मैदानावर पाऊल ठेवलेले नाही. पण माझ्या साध्यासुध्या आयुष्याला विविध प्रकाराने क्रिकेटचा निसटसा स्पर्श झाला त्याच्या काही मजेदार आठवणी
. .. ....... संपादन आणि एकत्रीकरण दि. ०१-०७-२०१९
-------------------------------
क्रिकेट क्रिकेट - भाग १
फक्त तीन चार इमारतींना जोडणारी एक लहानशी गल्ली आमच्या घराजवळ आहे. ही गल्ली लांबीला फारशी नसली तरी टाउन प्लॅनिंग करतांना तिला चांगली प्रशस्त रुंद बांधून ठेवली आहे पण सकाळ संध्याकाळचा थोडा कालावधी वगळता एरवी तिच्यावर वाहनांची विशेष वर्दळ नसते. शाळेला सुटी लागलेली असल्याने बरेच वेळा गल्लीतली मुले त्यावरच 'क्रिकेट क्रिकेट' खेळत असतात. परवा मी त्या गल्लीमधून चाललो असतांना सात आठ मुले तिथे 'गल्ली क्रिकेट' खेळत होती. लाकडाच्या एका आडव्या ठोकळ्यावर तीन वर्तुळाकार भोके पाडून त्यात तीन उभे दांडे बसवलेले पोर्टेबल स्टम्प्स अलीकडे मिळतात. त्या मुलांनी एका बाजूला असले स्टम्प्स ठेवले होते. अर्थातच हे डांबरी रस्त्याचे सुपर हार्ड पिच होते आणि त्यांचा खेळ टेनिसच्या सॉफ्ट बॉलने चालला होता. पिचच्या दुसऱ्या बाजूला रस्त्यावरच खडूने रेघा मारून 'क्रीज' बनवली होती. गल्लीच्या तोंडाशी एकादी मोटरगाडी य़ेतांना दिसली की लगेच स्टंप्सना उचलून बाजूला ठेवून आणि स्वतः रस्त्याच्या कडेला जाऊन ती मुले गाडीला वाट करून देत होती. पायी चालणाऱ्यांनी मात्र स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची असल्यामुळे मी चेंडूवर लक्ष ठेवून रस्त्याच्या कडेने फुटपाथवरून जपून चालत होतो.

मी हा खेळ पहात पहात पुढे जात असतांना बॅट्समनने टोलवलेला चेंडू थोडा जास्तच उडाला आणि रस्त्याच्या कडेला लावलेल्या एका मोठ्या वृक्षाच्या फांदीला निसटता लागून त्याच्या दाट पानांमध्ये घुसला आणि एक दोन सेकंदांनंतर पानांमधून वाट काढून सरळ घरंगळत खाली उतरला. तिथे उभ्या असलेल्या मुलाने त्याला अलगदपणे झेलून घेऊन झपाट्याने रस्त्यावर स्टम्पच्या ऐवजी मारलेल्या रेषेला लावला आणि "औट, औट" असा पुकारा केला. विरुध्द संघाची मुले प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पहायला लागताच तो मुलगा म्हणाला, "मी हा त्याचा कॅच पकडला आहे आणि याला रनआउट केले आहे. म्हणजे दोघेही औट ना?"
"चल रे, एका बॉलवर कधी दोघेजण औट होतात का?" एक मुलगा उद्गारला.
"पण त्यांच्यातला कोणी तरी औट व्हायलाच पाहिजे ना?"
यावर बॅट्समन म्हणाला, "अरे, माझा टोला तुझ्या डोक्याच्या किती तरी वरून जात होता आणि मागे दुसरा कोणी फील्डरही नव्हता. म्हणजे हे झाड मध्ये आले नसते तर बॉल नक्की बाउंडरीच्या पार जाऊन चौका किंवा छक्का होणार होता. त्यासाठी मला चार किंवा सहा रन मिळायला पाहिजेत."
"आणि बाउंडरीपलीकडे गेला की बॉल डेड होतो. मग रनआउटचा प्रश्नच येत नाही." त्याचा मित्र म्हणाला,
"पण प्रत्यक्षात काय झालं आहे ते बघा ना. बाउंडरीच्या आतच आणि जमीनीवर टप्पा पडायच्या आधीच मी या बॉलचा कॅच पकडला आहे ना? आणि तो डेड व्हायच्या आतच मी याला रनआउटही केले आहे."
"टप्पा म्हणजे फक्त जमीनीवरच बॉल पडायला पाहिजे असे काही नाही हं, भिंतीला किंवा झाडाच्या फांदीला आपटून बॉल उडाला तरी तो टप्पाच झाला. आज आपण "वन टप्पा औट गेम" खेळत नाही आहोत. त्यामुळे मी काही औट झालेलो नाही." बॅट्समन म्हणाला. दुस-या बाजूचा बॅट्समन लगेच म्हणाला, "अरे मी काही रन काढायसाठी पळालो नव्हता. आपला बॉल कुठे गडप झाला ते पहायसाठी थोडा पुढे आलो होतो. आजच आत्ताच मी हा नवीन बॉल विकत आणला होता, अजून एक ओव्हरपण झाली नाही, एवढ्यात तो हरवला असता तर पंचाईत झाली असती. म्हणून मी बॉल कुठे जातो आहे ते पहात होतो."
"म्हणून तू असा रडी खेळणार का?"
"मी नाही काही, तूच रडी खेळतोय्स."
अशी हमरातुमरी सुरू होताच त्यांच्यातला एक मोठा आणि समंजस मुलगा पुढे होऊन म्हणाला, "अरे, असे भांडताय्त काय? आपण आज असे रूल्स करूया की असं झालं तर औट, तसं झालं तर नॉटऔट ..... वगैरे."
तोंपर्यंत मी पुढे चालला गेलो होतो, त्यामुळे त्याने हा विवादग्रस्त बॉल कॅन्सल केला, की ती ओव्हर किंवा मॅचचा तो भागच रद्द करून नव्याने सुरुवात केली ते काही मला समजले नाही. माझ्या मनात विचार येत होते की खऱ्याखुऱ्या क्रिकेटमध्ये किती शेकडोंनी नियम आहेत! तरीसुध्दा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्वान आणि अनुभवी मंडळी जमून त्यात सारख्या सुधारणा करत असतात, ते नियम शिकून घेऊन व्यवस्थित प्रशिक्षण मिळालेले अंपायर प्रत्येक मॅचसाठी नेमले जातात आणि तेच प्रत्येक मॅचवर नियंत्रण ठेवतात. कुठल्याही सामन्यात सारखे ऐकू येणारे 'हौज्झॅट्'चे आवाज आणि त्यावर पंचाने कोठलाही निर्णय दिला की तो ज्या बाजूच्या विरोधात गेला असेल त्यातल्या खेळाडूंनी दिलेली प्रतिक्रिया पाहता या खेळाडूंना तरी सगळे नियम नीटपणे समजलेले आहेत की नाही किंवा या नियमांची त्यांना किती पर्वा करावीशी वाटते याबद्दल शंका येते. या वेळी खेळाडूंनी काढलेले उद्गार, त्यांच्या चेहेऱ्यावरील हावभाव आणि त्यांच्या देहबोलीमधून व्यक्त झालेली नाराजी हीसुध्दा किती प्रमाणात असली तर चालेल याविषयी सभ्यपणाचे नियम केले आहेत आणि त्यांचे उल्लंघन झाल्यास खेळाडूंना दंड केला जातो असे आपण पाहतो. या ऑफिशियल क्रिकेटबद्दल इतके छापले आणि सांगितले जात आहे की ते वाचणाऱ्या आणि ऐकणाऱ्यांना अजीर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे मला त्यात भर घालायची नाही.

पण आपल्या देशात असे जागतिक नियमांनुसार खेळले जाणारे क्रिकेट फार फार तर एकादा टक्का असेल आणि आपापले नियम तयार करून स्वैरपणे खेळले जाणारे क्रिकेट नव्याण्णऊ टक्के असणार असे मला वाटते. याचे कारण क्रिकेट या अद्भुत खेळात विलक्षण लवचिकपणाही आहे. दोन तीन पासून वीसपंचवीसपर्यंत कितीही मुले जमलेली असली तरी त्यांचे दोन गट पाडून ती क्रिकेट खेळायला लागतात. तसेच घरातल्या अंगणापासून विशाल क्रीडांगणापर्यंत कुठल्याही मोकळ्या जागेत तो खेळला जातो. लगान किंवा इकबाल या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे खेड्यापाड्यातली मुले रिकाम्या शेतांमध्ये देखील क्रिकेट खेळतात. शहरांमधल्या गल्ल्यांमध्ये हा खेळ सर्रास खेळला जातोच, शहरांमध्ये कोणी 'बंद' पुकारला असल्यास मोठमोठ्या हमरस्त्यांवरसुद्धा क्रिकेट खेळणे सुरू होते. आझाद मैदान, क्रॉसमैदान, शिवाजी पार्क यासारख्या मोठ्या मैदानांवर एकाच वेळी अनेक गट क्रिकेट खेळतांना दिसतात. खेळण्यासाठी उपलब्ध असलेल्या जागेचा आकार, खेळणाऱ्यांची उपस्थिती, हवामान वगैरे पाहून आपापसातच रोजच्या रोज सोपे असे नवे नियम तयार केले जातात आणि पाळले जातात. पुढे जगभरात नावलोकिक मिळालेल्या कितीतरी खेळाडूंनी आपल्या खेळाची सुरुवात गल्लीतल्या किंवा चाळीमधल्या क्रिकेटमधून झाली असल्याचे मुलाखतींमध्ये सांगितलेले मी ऐकले आहे.

खेळाडूचा विशिष्ट गणवेश अंगावर धारण करून, पॅड्स आणि गार्ड्स वगैरे बांधून औपचारिक स्वरूपाचा क्रिकेटचा सामना खेळण्याचे भाग्य माझ्या आयुष्यात कधीच माझ्या वाट्याला आले नाही कारण मला टोपी (क्रिकेटची कॅप) घालण्याचे धैर्य कोणालाही झाले नाही. पण मला कळायला लागल्यापासून 'क्रिकेट क्रिकेट'चा खेळ मात्र माझ्या आवडीचा होता. अगदी लहान असतांना कचाकड्याच्या 'बॅटबॉल'ने आमच्या घराच्या गच्चीवर सुरुवात करून मी हळूहळू गल्लीपासून मैदानापर्यंत प्रगती केली, पण चुकूनसुध्दा कधीही मैदान गाजवले मात्र नाही. शाळेत असतांना मी माझ्या वर्गातला वयाने सर्वात लहान मुलगा होतो कारण अॅडमिशन घेण्याच्या वेळी माझ्या वयाच्या मानाने बुध्दीची वाढ जरा जास्तच झाली होती आणि अक्षरे व अंक यांचे ज्ञान घरातच झाले होते. त्यामुळे पहिलीच्या मास्तरांनी मला काय काय येते हे पाहून दुसरीत आणि त्या मास्तरांनी थेट तिसरीत नेऊन बसवून दिले होते. त्या काळात फॉर्म भरणे आणि त्याला बर्थसर्टिफिकेट जोडणे वगैरे भानगडी नव्हत्याच. माझ्या शरीराची वाढ मात्र वयाच्या मानाने थोडी हळू हळूच होत असावी. त्यामुळे माझ्या वर्गात माझे वय कमी होते तसेच वजनही सर्वात कमी होते. आमच्या वर्गातला गिड्ड्या रास्ते सुरुवातीपासून शालांत परीक्षेपर्यंत उंचीने 'डेढफुट्या'च राहिला असला तरी तोसुध्दा शक्तीच्या बाबतीत मला जरा भारीच पडत असे. यामुळे हुतूतूपासून क्रिकेटपर्यंत सगळ्या मैदानी खेळात मी नेहमी 'लिंबूटिंबू'च मानला जात असे. या परिस्थितीत क्रिकेटच्या बाबतीत मी अभिमानाने सांगावे असे काहीच माझ्या जीवनात कधीच घडले नाही, पण लहानपणच्या काही मजेदार आठवणी मात्र आहेत.

.  . . . . . . . . . 
क्रिकेट क्रिकेट - भाग २

क्रिकेटच्या खेळात दोन्ही बाजूच्या संघांमध्ये प्रत्येकी अकरा खेळाडू असतात, त्यातला जो संघ बॅटिंग करत असतो त्याचे फक्त दोनच खेळाडू मैदानात प्रत्यक्ष खेळत असतात, उरलेले मैदानाबाहेर बसलेले असतात. खेळणारा एक बॅट्समन औट झाल्यावर तो मैदानाच्या बाहेर जातो आणि दुसरा त्याची जागा घेतो. दुसरा संघ बॉलिंग आणि फील्डिंग करत असतो त्याचे सारे म्हणजे अकराही खेळाडू मैदानावर उतरून खेळात भाग घेत असतात. एवढी तरी प्राथमिक माहिती आजकाल सगळ्यांनाच असते. पण आमच्या मुलांच्या क्रिकेटमध्ये असले मूलभूत नियमसुध्दा नसायचे. दुपार टळली की मित्रमंडळी एकमेकांना बोलावून आणि ज्याच्याकडे बॅट, बॉल, स्टंप्स वगैरे जी सामुग्री असेल ती घेऊन मैदानाकडे येऊ लागत आणि जितकी मुले जमतील तेवढ्यावर खेळ सुरू करून देत. त्यासाठी दोन टीम बनवण्याचीसुध्दा गरज पडत नसे. मुलांची आपापसातच आळीपाळीने बॅटिंग आणि बॉलिंग चालत असे. एक मुलगा बॉल टाकायचा आणि दुसरा बॅटिंग करायचा. तिसरा वाट पहात फील्डिंग करायचा. बॅटिंग करणारा मुलगा औट झाला तर तिसरा त्याची जागा घ्यायचा आणि पूर्ण ओव्हरमध्ये तो औट नाही झाला तर तिसरा मुलगा बॉलिंग करायचा. चौथा, पाचवा, सहावा वगैरे मुले अशाच प्रकारे आपल्याला आळीपाळीने बॅटिंग किंवा बॉलिंग मिळायच्या संधीची वाट पहात फील्डिंग करत रहायचे. टीमच नसल्यामुळे धावा मोजायची गरज नसायची. कधी कधी तर असे व्हायचे की बॅट्समन औट होताच ती ओव्हर अर्धवट सोडून बॉलरच "माझी पाळी आली" म्हणून बॅट हातात घ्यायचा आणि त्याची उरलेली ओव्हर औट झालेला मुलगा पूर्ण करायचा. म्हणजे एका ओव्हरमध्येच बॉलर आणि बॅट्समन यांचे 'रोल रिव्हर्सल' होत असे. दोन गट बनवण्याएवढी म्हणजे दहा बारा इतकी गणसंख्या झाल्यावर लीडर टाइपची दोन मुले कॅप्टन होत आणि "मन्या, तू माझ्या टीममध्ये", "पक्या तू माझ्याकडे", "सुऱ्या तू इकडे ये", "रम्या, इकडे", "चंद्या", "नंद्या" ..... असे करून सगळ्या मुलांची दोन गटात वाटणी करून घेत. त्यानंतर उशीराने येऊन पोचलेली मुलेही एकजण या आणि दुसरा त्या अशा प्रकारे या ना त्या संघात सामील होत जात. 

जमलेल्या मुलांची संख्या वीस पंचवीस इतकी मोठी संख्या कधी झाली तरच क्रिकेटच्या नियमाप्रमाणे एक 'बॅटिंग साइड' आणि दुसरी 'फील्डिंग साइड' अशी विभागणी होत असे. एरवी दोन लहान लहान संघ बनले असले तरी त्यातले दोन बॅट्समन सोडून इतर सगळी मुले आनंदाने फील्डिंग करत, बॉलिंग मात्र फक्त विरुध्द संघाच्या मुलांनी करायची. फिल्डिंग करतांना आपल्या संघातल्या खेळाडूचा कॅच सोडायचा, त्याने मारलेला फटका अडवायचा नाही अशा प्रकारची 'चीटिंग' कोणी करत नसे. कोणीही तसे मुद्दाम केलेले आढळल्यास त्याला बॅटिंगचा चान्स मिळणार नाही एवढीशी शिक्षा असायची. शिवाय त्या दिवशीचे दोन संघ त्या खेळापुरते, दुसऱ्या दिवशी इकडची काही मुले तिकडे आणि तिकडची इकडे असे होणार असल्यामुळे त्या तात्पुरत्या संघात संघभावना कशी तयार होणार? रोजच्या खेळातला डाव जिंकण्याहरण्याला फार महत्व असायचेही नाही. खेळण्यातला आनंद उपभोगणे इतका साधा उद्देश मनात ठेवून खेळणे होत असे.   

आजकाल क्रिकेटच्या मॅचसाठी मुद्दाम वेगळी खेळपट्टी (पिच) तयार केली जाते. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेमधून वाळू आणि न्यूझीलंडमधून खडी आणली अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जातात. अमाप खर्च आणि श्रम करून ती तयार केली असली तरी मॅच सुरू झाल्यानंतर संपण्याच्या आधीच ही नखरेल खेळपट्टी आपले गुण पालटत राहते. सुरुवातीला तिच्यावर टाकलेला चेंडू चांगली उसळी घेतो त्यामुळे ती जलदगती गोलंदाजांना (पेस बोलर्सना) साथ देते. तेच पिच जुने झाल्यानंतर त्यावर बॉल चांगले वळायला लागतात. त्यामुळे ते फिरकी गोलंदाजांना (स्पिनर्सना) मदत करते. असे असे घडले असे कॉमेंटेटर्स कधी कधी सांगत असतात. काही खेळपट्ट्या फलंदाजांच्या सोयीसाठी अशा प्रकारे बनवल्या जातात की त्या कुठल्याच प्रकारच्या बोलरला कसलीच साथ देत नाहीत. पिचच्या या गुणधर्मांमुळे टॉस जिंकून झाल्यावर आधी बॅटिंग करायची की फील्डिंग असा एक मोठा निर्णय कॅप्टनने घ्यायचा असतो. नाणेफेक जिंकूनसुध्दा एकादी टीम हरली तर तिच्या कर्णधाराने चुकीचा निर्णय घेतल्याबद्दल त्याला जबाबदार धरले जाते. हे सगळे वाचतांना मला तरी हसू येते. कोणची टीम जिंकणार हे जर टॉसवरच ठरत असेल तर त्या मॅचला काय अर्थ राहिला? आमच्या लहानपणच्या क्रिकेटमध्ये खेळपट्टीची भानगडच नसायची. गावाबाहेरच्या ज्या सार्वजनिक मोकळ्या मैदानावर आम्ही खेळायला जात असू तिथे मुलांची इतर टोळकीही येत, तसेच फिरायला आलेली माणसेही गवतावर बसून गप्पा मारत. त्यामुळे आमची खेळण्याची जागाच रोज बदलत असे. सोयिस्कर मोकळी जागा बघून त्यातल्या त्यात सपाट अशा जागेवर स्टंप ठोकून आणि त्याच्या आसपासचे दगड धोंडे वेचून ते बाजूला करून आमचे नित नवे पिच तयार होत असे. 

खेळाच्या इतर बाबतीतसुध्दा परिस्थितीनुसार नवनवे नियम बनवले जात आणि पाळले जात. दोन्ही बाजूला तीन तीन स्टंप ठेवणे आम्हाला कधीच शक्य होत नसे. त्यामुळे ओव्हर संपल्यानंतर विकेट कीपर त्याच्या जागेवरच उभा रहात असे, सगळे बोलर एकाच बाजूने बॉल टाकत. तिथे पॅव्हिलियन एंड, चर्च एंड अशासारख्या दोन बाजू नसत. ओव्हर झाली की दोन्ही बाजूचे बॅट्समन रन काढल्याप्रमाणे आपल्या जागा बदलत. जिथे खेळपट्टीचाच पत्ता नसायचा तिथे आखलेल्या सीमारेषा कुठून येणार? डाव सुरू करतांनाच काही खुणा ठरवून ती बाउंडरी मानली जात असे. शहरातल्या गल्लीत क्रिकेट खेळणारी मुले सुध्दा पहिल्या मजल्यावर बॉल गेला किंवा कोणाच्या खिडकीची काच फुटली कि बॅट्समन आउट, ठराविक रेषे पर्यंत बॉल गेला कि दोन रन्स, त्याच्या पुढे दुसऱ्या रेषे पर्यंत बॉल गेला कि चार रन्स, रेषेवरून गेला कि ६ धावा असे नियम करतात. फील्डर्सची संख्या कमी असली तर बॉल कुठल्या दिशेने फटकारायचा याचे नियम ठरवले जातात. आमच्या खेळात असेच काही नियम एकदा ठरवले होते, त्या दिवशी मी उशीरा पोचलो होतो. पण माझी क्षमता पाहून मला ते नियम सांगण्याची गरज कुणाला वाटली नाही. नेहमीप्रमाणे सर्वात शेवटी माझी बॅटिंगची पाळी आली. तोपर्यंत अंधार पडायची वेळ झाली होती. नेहमीप्रमाणे दोन तीन चेंडूमध्ये माझी विकेट काढून घरी परतायचा माझ्या मित्रांचा विचार होता. पण त्या दिवशी काय झाले कोण जाणे, पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर पडून उसळतांना मला दिसला आणि काही विचार न करता मी बॅट फिरवली आणि तो चेंडू लाँग लेगच्या दिशेने पार नजरेपल्याड चालला गेला. कित्येक दिवसात मी एवढा दूर फटका मारला नसल्याने मी स्वतःवर भयंकर खूष झालो होतो, पण सगळे मित्र मात्र चिडून माझ्या अंगावर धावून आले. स्टंपच्या मागच्या बाजूला ठेवायला क्षेत्ररक्षक उपलब्ध नसल्याने "कोणीही त्या बाजूला फटका मारायचा नाही, बॉलला फक्त पुढच्या बाजूलाच ढकलायचा." असा त्या दिवसापुरता नियम केला होता म्हणे. त्यामुळे माझ्या कर्माची शिक्षा म्हणून मलाच एकट्याने मागे जाऊन अंधुक होत असलेल्या प्रकाशात गवत आणि काट्याकुट्यामधून तो चेंडू शोधून आणण्याचे काम करावे लागले. करकरीत तीन्हीसांजेच्या वेळी मनातल्या मनात रामरक्षा म्हणत केलेल्या या प्रायश्चित्ताची आठवण जन्मभर राहिली.
--------------

क्रिकेट क्रिकेट - भाग ३

माझ्या लहानपणच्या काळात मामलेदार कचेरी, नगरपालिका कचेरी, पोस्ट ऑफिस आणि एक सहकारी बँक एवढीच 'ऑफिसे' आमच्या लहान गावात होती. त्या सगळ्या इमारतींमधले वातावरण थोडे गावठीच असायचे. पट्टेवाले किंवा पोस्टमन यांच्यासारखे मोजके गणवेशधारी सेवक वगळल्यास तिथे दिसणारे बहुतेक लोक अंगात सदरा (शर्ट), डोक्यावर टोपी किंवा पागोटे आणि कंबरेला धोतर किंवा लेंगा (पायजमा) अशासारख्या गावठी पोशाखात असत. गावातल्या पांढरपेशा लोकांची संख्या एकंदरीत कमीच असल्यामुळे पँट धारण करणारे तरुण कमीच दिसत पण त्यांची संख्या दिवसेदिवस वेगाने वाढत जात होती. तरीही फक्त खेळासाठी म्हणून डोक्यावरील कॅपपासून पायातील बुटांपर्यंत नखशिखांत पांढरा शुभ्र ड्रेस घालून क्रिकेटची मॅच खेळू शकणारे युवक त्यांच्यात शोधूनही निघाले नसते. त्या काळात मुलांचे 'खेळायचे वय' संपले की त्यांनी पूर्णवेळ 'कामाला' किंवा 'उद्योगधंद्याला' लागायचे अशी रीत असल्यामुळे त्या गावात मोठ्या माणसांचे मैदानी खेळांचे फारसे सामने होत नसत. मी आमच्या गावातल्या प्रौढांना हुतूतू, कुस्ती आणि व्हॉलीबॉल याव्यतिरिक्त इतर कोणता मैदानी खेळ खेळतांना पाहिल्याचे मला आठवत नाही. त्या काळात भारतात टेलिव्हिजन सुरू झालेला नसल्यामुळे घरबसल्या क्रिकेटचा सामना पाहण्याची सोयही नव्हती. थोडक्यात सांगायचे झाल्यास मी कॉलेजच्या शिक्षणासाठी शहरात आल्यानंतर क्रिकेटचा खरा नियमानुसार असा खेळ पहिल्यांदा पाहिला.

त्या काळात क्रिकेटच्या कसोटी सामन्यांच्या कॉमेंटरीचे प्रसारण रेडिओवर येत होते. पण वर्षभरामध्ये क्रिकेट या खेळाचा फक्त एकच 'सीझन' येत असे आणि त्या कालावधीतसुध्दा दोन तीन वर्षांमध्ये एकदा एकादी परदेशी टीम क्रिकेट खेळण्यासाठी भारतात येत असे किंवा आपले खेळाडू 'फॉरेन टूर'वर जात असत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांचे संघ माझ्या शालेय जीवनाच्या आठवणीत फक्त एकेकदाच भारतात येऊन गेले असावेत. क्रिकेटची कॉमेटरी हा तेंव्हा आजच्यासारखा रोजचा मामला नव्हता. गावात प्रत्येकाच्या घरी रेडिओ असायचा नाही आणि असला तरी तो घरातल्या मुलांच्या वाट्याला क्वचितच येत असे. चुकून एकाद्या घरातल्या मोठ्या लोकांना क्रिकेटची कॉमेंटरी ऐकण्याचा षौक असलाच तर मग त्या घरातल्या मुलांच्या कानावर कॉमेंटरी पडायची. क्रिकेट टेस्ट मॅचेसच्या दिवसात अभ्यासाचे किंवा खेळायचे निमित्य करून त्या मुलाचे मित्र त्याच्या घरी जाऊन आणि थोडीशी कॉमेंटरी ऐकून धन्य होत. हॉटेले, पानपट्टीचे ठेले, सायकलीची (म्हणजे सायकली भाड्याने देण्याची) दुकाने अशा गावातल्या काही ठिकाणी नेहमीच रेडिओवर सिनेमाची गाणी मोठ्याने लावलेली असत. त्यातले काही लोक मात्र टेस्ट मॅचेस सुरू झाल्यावर गाण्यांऐवजी क्रिकेटची कॉमेंटरी लावून ठेवत. काही उत्साही लोक, मुख्यतः पोरेटोरे दुकानांच्या दारात उभी राहून ती ऐकत असत. 

आपल्या देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजी भाषेचीही हकालपट्टी करायचा चंग त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी बांधला होता. आम्ही आठवी इयत्तेत गेल्यानंतर एबीसीडी शिकण्यापासून सुरुवात केली. ए टु झे़ड ही सव्वीस अक्षरे गिरवून झाल्यानंतर हळूहळू शब्द, वाक्यरचना, व्याकरण वगैरे थोडे फार शिकेपर्यंत आमचे शालेय शिक्षण संपून गेले. शालांत परीक्षेसाठी इंग्लिश हा एक ऐच्छिक विषय होता. ज्यांनी कॉलेज शिक्षण घेण्याचा विचारही केला नव्हता अशा बहुसंख्य मुलांनी तो घेतलाच नाही. आम्हाला इंग्रजी शिकवणारे अपसंगी, दोडवाड वगैरे सरांची गणना गावामधल्या विद्वान व्यक्तींमध्ये होत असे, पण शेक्सपीयर, शॉ, वर्डस्वर्थ वगैरेंचे साहित्य ते कोळून प्यायले असले तरी एबीसीडी शिकण्याच्या पातळीवरल्या आम्हाला त्याचा काय उपयोग होणार? त्यातून त्यांची मातृभाषा कानडी असल्याने त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व नव्हते. आम्हाला इंग्रजी सिनेमा किंवा मालिका, डॉक्युमेंटरीज वगैरेंचे दर्शनही झाले नव्हते. या परिस्थितीत शाळेत असेपर्यंत आमचे इंग्रजी भाषेचे ज्ञान यथातथाच राहिले. शाळेमधला इंग्रजीचा तास सोडल्यास एरवी त्या भाषेतला चकार शब्द बोलण्यात किंवा ऐकण्यात येत नसे. त्या वेळी क्रिकेटच्या कॉमेटरीमधूनच त्या भाषेतली चार वाक्ये कधी तरी आमच्या कानावर पडत होती. त्याचा अर्थ लावायच्या प्रयत्नातून आमचे किंचित ट्रेनिंग होत होते. 

ऐकलेल्या कॉमेंटरीमधले फारच थोडे त्या वेळी आम्हाला समजत असे, पण पुन्हा पुन्हा ऐकून आणि शहाण्या लोकांना विचारून विचारून त्यातली क्रिकेटची परिभाषा ध्यानात येऊ लागली. इनस्विंगर, औटस्विंगर, लेग स्पिन, ऑफस्पिन, स्लिप, शॉर्ट लेग, कव्हर, हिट विकेट, क्लीन बोल्ड यासारख्या शब्दांचे अर्थ समजायला लागले. मैदानातल्या कोणकोणत्या जागांवर क्षेत्ररक्षक उभे आहेत (फील्ड प्लेसमेंट्स) हे पुन्हा पुन्हा सांगितले जात असल्यामुळे ते चित्र कल्पनेने डोळ्यासमोर येऊ लागले. पण आम्हाला त्यात त्या काळी फारसे स्वारस्य वाटत नव्हते. कोणती टीम बॅटिंग करते आहे, कोणकोण बॅट्समन खेळत आहेत, त्यांच्या आणि संघाच्या किती धावा झाल्या, किती विकेट्स गेल्या ही माहिती तेवढीच महत्वाची. अखेर कोण जिंकत आहे आणि कोण पराभूत होत आहे हे त्यावरून ठरते. यामुळे सर्वांना त्यातच इंटरेस्ट असायचा.

त्या काळात 'पियरसन' अशा इंग्लिश नावाचे एक भारतीय कॉमेंटेटर होते, त्यांचा भरदार आवाज आणि बोलण्याची स्टाईल सर्वांना इंप्रेस्सिव्ह वाटायची. 'महाराजकुमार ऑफ विजयानगरम्' एवढे लांबलचक आणि 'विझी' असे छोटेसे नाव धारण करणारे गृहस्थ अचाट लांबण लावायचे आणि त्यातले अवाक्षरही आम्हाला समजत नसे. कुठल्याशा जुन्या आठवणी घोळवून सांगता सांगता "दरम्यानच्या काळात चार विकेट पडल्या आहेत आणि आता अमके तमके क्रीजवर आले आहेत" अशी त्या सुरू असलेल्या खेळाबद्दल थोडीशी माहिती ते देत. विजय मर्चंट हे कॉमेंटेटर मात्र सर्वांचे अत्यंत लाडके होते. त्यांच्या खणखणीत आवाजात प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार करून ते अक्षरशः 'बॉल टू बॉल' कॉमेंटरी करत असत, ते स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू होते, त्यामुळे त्यांना क्रिकेटमधल्या खाचाखुचा चांगल्या ठाऊक होत्या आणि सोप्या शब्दात ते श्रोत्यांना समजावून सांगत असत. मुख्य म्हणजे रेडिओवरील खरखरीमधून फक्त त्यांचेच बरेचसे उच्चार आम्हाला समजत होते. तटस्थ वृत्ती न बाळगता ते खेळाशी समरस होऊन जात आणि त्यांच्या मनातली देशप्रेमाची भावना त्यांच्या कॉमेंटरीमध्ये उतरत असे.

मला गणितात पहिल्यापासूनच आवड आणि गति असल्यामुळे क्रिकेटच्या आकडेवारीचे थोडेसे वेड होते. क्रिकेटमध्ये जेवढे स्टॅटिस्टिक्स येते तेवढे अर्थकारणातदेखील कदाचित येत नसेल. कोणत्या संघाने किंवा खेळाडूने कुठे कुठे आणि कोणकोणते पराक्रम केले याची सविस्तर जंत्री वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये येत असे. आम्ही ती गोळा करून सांभाळून ठेवत होतोच, पण प्रत्येक सीझनमध्ये कितीतरी जुने रेकॉर्ड्स मोडले जात आणि नवे विक्रम प्रस्थापित केले जात असत. या सगळ्याची इत्थंभूत माहिती आम्हाला तोंडपाठ असे. एकादा बॅट्समन किंवा बोलर जरासा यशस्वी व्हायला लागला की लगेच तो कोणत्या विक्रमापासून किती दूर आहे हे पाहिले जात असे आणि नव्या विक्रमाचे वेध लागत असत. तो सामना जिंकण्याहरण्यापेक्षाही त्या सामन्यात अमूक रेकॉर्ड मो़डला जाणार की नाही याची उत्सुकता कधी कधी जास्त वाटत असे.

त्या काळातली एक मजेदार आठवण आहे. आमच्यातला अरविंद पोटे नावाचा एक मुलगा चांगला क्रीडापटू होता आणि थोडी दादागिरीही करायचा. सुरुवातीपासून शाळा सोडेपर्यंत तोच आमचा कॅप्टन असायचा. एरवी तो स्वतःला देव आनंद समजत असे आणि त्याच्यासारखा केसाचा कोंबडा ठेवून थोडे हावभावही करत असे. क्रिकेटच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू रिची बेनो त्याचा हीरो होता. फील्डिंग करतांना सिली मि़ड ऑफ या जागेवर बॅट्समनच्या अगदी पुढ्यात हा रिची उभा रहात असे आणि एकादा बॉल प्लेड करतांना किंचितसा जरी वरच्या बाजूला उडाला तर हनुमानउडी मारून त्याचा कॅच पकडत असे. अर्थातच कॉमेंटरीमध्ये ऐकून आणि वर्तमानपत्रांमध्ये वाचून ही माहिती आम्हाला मिळाली होती. असले धाडस करणे त्या काळात दुर्मिळ असायचे. आमचा अरव्यासुध्दा एकदा असा रिची बेनोसारखा सिली मि़ड ऑफला उभा राहिला असतांना योगायोगाने माझी बॉलिंगची पाळी आली होती. मलाही वेगाने बॉल टाकता येतो हे दाखवायचे म्हणून मी सगळा जोर लावून चेंडू फेकला आणि कधी नव्हे तितक्या वेगाने तो गेला, पण त्या नादात त्याची दिशा थोडी चुकली आणि सरळ अरव्याच्या पाठीवर दाणकन आपटला. 

.  . . . . . .  . . . . . . . . .  (क्रमशः)

क्रिकेट क्रिकेट - भाग ४

कॉन्व्हेंट स्कूल, मिलिटरी स्कूल, पब्लिक स्कूल यासारख्या काही शाळांमध्ये शिक्षणाबरोबरच खेळांनासुध्दा खूप महत्व दिले जाते. अशा शाळांमधून आलेली काही मुले आमच्याबरोबर इंजिनियरिंगला होती, तसेच काही मुलांनी क्लब, जिमखाना वगैरेंमध्ये जाऊन क्रिकेटचे खास प्रशिक्षण घेतलेले होते. यामुळे आमच्या इंजिनियरिंग कॉलेजमधल्या क्रिकेटचा दर्जा खूपच वरचा होता. सिलेक्शन ट्रायल्ससाठी येणाऱ्या मुलांची संख्या आणि प्रत्येकाची तयारी चांगली होती. तिथे लिंबूटिंबूंसाठी काहीच स्कोप नव्हता. मी शिकत असतांना तीनही वर्षी पुणे विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा आमच्या कॉलेजच्या संघानेच जिंकल्या. या कॉम्पिटिशनमधल्या प्रत्येक मॅचच्या वेळी आपल्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी आमच्या हॉस्टेलमधून मुलांच्या झुंडी त्या ग्राउंडवर जाऊन पोचायच्या. आर्ट्स अँड सायन्स कॉलेजबरोबर सामना असेल तर त्यांच्या बाजूने मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी मुलीही यायच्या हे एक अॅडेड अट्रॅक्शन असायचे. प्रत्येक चौकार, षट्कार किंवा विरुध्द संघाची विकेट यावर टाळ्या, शिट्या, आरडाओरड, नाच वगैरे मनसोक्त धांगडधिंगा घालण्याची चढाओढ चालत असे. मैदानात आमचा संघ जिंकायचाच, प्रेक्षकांमधल्या धांगडधिंग्याच्या सामन्यातसुध्दा आमचाच आवाज वरचढ असायचा. क्रिकेटमुळे कशी धुंदी चढते हे मी त्या काळात अनुभवले. तसेच प्रत्यक्ष क्रीजवर बॅट आणि बॉल यांच्या दरम्यान नेमके काय घडत असते हे दुरून पाहणाऱ्या प्रेक्षकांना नीट दिसतसुध्दा नाही हेही समजले. हजारो रुपयांची तिकीटे काढून मॅच पहायला स्टेडियमवर गर्दी करणाऱ्यांची मला धन्य वाटते. त्यापेक्षा घरबसल्या टीव्हीवर मॅच पहात असतांना क्लोज अप व्ह्यूमध्ये जास्त चांगले दाखवले जाते. आता तर अॅक्शन रिप्लेमधून ते व्यवस्थित दिसते. स्टेडियममधले प्रेक्षकही ते  मोबाईल फोनवर पाहू शकतात.

शाळेत असतांना कधी कधी आमची टीम आणि इतर मुलांच्या टीममध्ये मॅचेस होत असत. अर्थातच त्यातसुध्दा आम्हीच बनवलेल्या नियमांनुसार क्रिकेट क्रिकेटचा स्वैर खेळ होत असे. माझ्या गणितातल्या कौशल्यामुळे मला काही वेळा अशा सामन्यांमध्ये स्कोअररचे काम मात्र मिळत असे आणि माझ्या समजुतीनुसार झालेल्या धावांची संख्या आणि विकेट्स यांची नोंद ठेऊन मी स्कोअरकार्ड तयार करत असे. एका इंटरकॉलेज क्रिकेट मॅचच्या वेळी मी कुतूहलाने स्कोअररपाशी जाऊन बसलो. माझा एक मित्र सुधीर त्यासाठी एक वही घेऊन आला होता आणि प्रत्येक बॉल पिचवर कुठे पडला, त्याला बॅट्समनने कोणत्या दिशेने टोलवले, किंवा त्या बॉलने बॅट्समनला चकवले, तो चेंडू कुठे अडवला गेला, त्यावर किती धावा मिळाल्या वगैरेंची सचित्र नोंद तो ठेवत होता. आजकाल अशा गोष्टी काँप्यूटरच्या सहाय्याने अॅक्शन रिप्लेमध्ये दाखवल्या जातात, कदाचित त्या रेकॉर्डही केल्या जात असतील, पण पन्नास वर्षांपूर्वी केल्या गेलेल्या अशा तपशीलवार नोंदी पाहून मी चाट पडलो होतो.

कॉलेजला गेल्यानंतर क्रिकेटच्या बाबतीत माझी भूमिका फक्त आणि फक्त प्रेक्षकाचीच राहिली. सामन्यांची संख्या जसजशी वाढत गेली, तसतसा त्यातला माझा इंटरेस्ट कमी कमी होत गेला. अजूनही मी काही वेळा टीव्हीवर हा खेळ पहातो, पण आता त्याची तितकी क्रेझ राहिली नाही. वर्ल्ड कप सारखे सामने मात्र आवर्जून पहातो.

माझ्या मुलांच्या जन्माच्या आधीच आमच्याकडे टीव्ही आला होता आणि ते दोघेही त्यांना समज येण्याच्याही आधीपासून टीव्हीवर भरपूर क्रिकेट पहात होते. अगदी लहान असतांना सुध्दा ते निरनिराळे बोलर, बॅट्समन, फील्डर्स आणि अंपायर यांच्या विशिष्ट लकबी नक्कल करून दाखवत आणि सर्वांना हसवत असत. ते वर्ष दीड वर्षाचे झाले असतांनाच वीतभर लांबीची प्लॅस्टिकची पोकळ बॅट आणि लिंबाएवढा बॉल या वस्तू त्यांच्या खेळण्यांमध्ये जमा झाल्या आणि त्या बॅटने ते बॉलशी ठोकाठोक करायला लागले. पुढे त्या खेळण्यांचे आकार आणि प्रकार बदलत गेले असले तरी बॅटबॉल खेळतच ते लहानाचे मोठे झाले, शाळेत आणि कॉलेजात रेग्युलर क्रिकेट खेळले. ते आता ऑफिसमधल्या सहकाऱ्यांबरोबर खेळत आहेत आणि जिंकून आणलेल्या ट्रॉफीजनी आपल्या दिवाणखान्याची शोभा वाढवत आहेत. ते अगदी लहान असतांना मी घरात किंवा बाहेरच्या पॅसेजमध्ये त्यांच्या बरोबर खेळत होतो, ते थोडे मोठे झाल्यानंतर त्यांच्या मित्रांबरोबर खेळू लागले. शाळा आणि कॉलेजमध्ये सगळ्या नियमांप्रमाणे क्रिकेट खेळत असतांना बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत त्यांचे गल्ली क्रिकेटही चालत असे. खेळायला कोणी मित्र नसेल किंवा धो धो पाऊस पडत असेल अशा वेळी ते दोघेच आमच्या एकोणीसाव्या मजल्यावरच्या लिफ्टच्या लॉबीमध्ये खेळायचे. एकाने सरपटत चेंडू टाकायचा आणि दुसऱ्याने तो जमीनीलगतच परत (बॅक टू द बोलर) पाठवायचा. शेजाऱ्याचे दार म्हणजे स्टंप्स, त्याला बॉल लागला की बॅट्समन औट आणि परत केलेला चेंडू बोलरला अडवता आला नाही आणि त्याच्या मागे असलेल्या भिंतीला लागला की एक रन अशा प्रकारचे नियम ते पाळायचे. चुकून बॉल उडाला आणि कठड्यावरून खाली गेला तर मात्र तो मिळायची शक्यता फारच कमी असायची. मग त्या दिवसाचा खेळ बंद.

कधी कधी तर ते डाईस घेऊन काल्पनिक क्रिकेट खेळायचे. जगभरातले उत्तमोत्तम खेळाडू निवडून त्यांचे दोन संच बनवत आणि त्यातल्या एकेकाच्या नावाने डाईस फेकून १, २, ३, ४ किंवा ६ आकडा आला तर तितके रन्स आणि ५ आकडा आला तर औट असे स्कोअर लिहीत असत. हा खेळ एकटासुध्दा खेळू शकतो आणि खेळला जात असे. घरी काँप्यूटर आणल्यानंतर थोड्याच दिवसात क्रिकेट या खेळाची सीडी आली आणि त्यांचे त्यावर व्हर्च्युअल क्रिकेट खेळणे सुरू झाले. काँप्यूटरची क्षमता जसजशी वाढत गेली त्यासोबत या खेळाच्या सॉफ्टवेअरमध्ये अपार सुधारणा होत गेली. अगदी खरेखुरे छायाचित्र वाटेल इतके चांगले खेळाडू आजकाल या खेळामधल्या स्क्रीनवर दिसतात आणि आपण त्यांना आज्ञा देऊ त्यानुसार ते बोलिंग व बॅटिंग करतात. इतकेच नव्हे तर गॅलरीमधले प्रेक्षकसुध्दा टाळ्या वाजवून दाद देतात आणि चीअर गर्ल्स नाचतांना दिसतात. हा एक काँप्यूटर गेम आहे की प्रत्यक्ष होत असलेल्या मॅचचे थेट प्रक्षेपण आहे असा संभ्रम पडावा इतके ते रिअॅलिस्टिक वाटते.

मॅच फिक्सिंगच्या प्रकारांमुळे या खेळात अप्रामाणिकपणा शिरला असला तरी तो एक आकर्षक खेळ आहे आणि आज मनोरंजनाचे एक साधन बनला आहे असा विचार केला तर त्यात भावनात्मक रीत्या गुंतून पडण्याचे (इमोशनली इन्व्हॉल्व्ह होण्याचे) कारण नाही. नाटक सिनेमांमध्ये दाखवले जाणारे सगळेच काल्पनिक असते, त्यांच्या कथांमध्ये आपण सत्य शोधत नाही. आयपीएल हा प्रकार मला तरी यापेक्षा कधीच वेगळा वाटला नाही. त्यातही मुंबई, दिल्ली किंवा चेन्नै या नावाच्या संघांचा त्या गावांशी संबंध नसतो. जगभरातले क्रिकेटर लिलावात विकले जाऊन त्यांच्याकडे येतात आणि भाडोत्री खेळाडू म्हणून खेळतात. त्यामुळे मला त्यातला कुठलाच संघ आपला वाटत नाही आणि एक बाजू आपली नसली तर त्या खेळातल्या कुणाच्या जिंकण्याहरण्याचे आपल्याला काही वाटत नाही. तरी पण बॅट्समनांची अप्रतिम फटकेबाजी आणि फील्डरांनी उड्डाण करून किंवा जमीनीवर सूर मारून घेतलेले झेल यातली कलाकारी पाहण्यासारखी असते.

तर अशा प्रकारे निरनिराळ्या स्वरूपांमध्ये माझ्या जीवनात क्रिकेट आले आणि ते काही त्याने घेऊन ठेवलेला एका कोपऱ्याचा ताबा सोडायला तयार नाही.
 . . . . . . . . .  (समाप्त)
------------
हा लेख इथेही.
https://anandghare2.wordpress.com/2019/07/01/%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%9f/