Thursday, August 21, 2008

एक धागा सुखाचा


एक धागा सुखाचा (पूर्वार्ध)



'विठ्ठला, तू वेडा कुंभार' या महाकवी ग.दि.माडगूळकर यांनी लिहिलेल्या गीतामधील आशय शोधण्याचा प्रयत्न मी नुकताच सहा भागात केला होता. 'एक धागा सुखाचा' या अशाच धर्तीच्या गीतामधील कांही ओळींचा उल्लेख त्या लेखात आला होता. राजा परांजपे यांच्या 'जगाच्या पाठीवर' या प्रसिद्ध चित्रपटासाठी गदिमांनीच हे गीत लिहिले आहे. या गीतामध्येसुद्धा त्यातील ओळींचा शब्दशः अर्थ आणि त्यामागील भावार्थ वेगवेगळे आहेत. 'वेडा कुंभार' या लेखात केलेल्या विश्लेषणाची पुनरुक्ती न करता त्याहून जे कांही वेगळे या गीतात सांगितले गेले आहे तेवढेच या लेखात थोडक्यात मांडणार आहे.

'जगाच्या पाठीवर' या चित्रपटात एका सरळमार्गी सज्जन माणसाची मध्यवर्ती भूमिका राजाभाऊंनी स्वतः अप्रतिम साकार केली आहे. त्यातील कथानायकाला त्याच्या हातून घडलेल्या एका गुन्ह्यासाठी सश्रम कारावासाची शिक्षा होते. सक्तमजूरीसाठी तुरुंगात असतांना त्याला हातमागावर कापड विणण्याचे काम दिले जाते. हे काम करता करता स्वतःशीच पण अवघ्या मानवजातीला उद्देशून हे गाणे म्हणतांना त्याला एका प्रसंगात दाखवले आहे. तुरुंगामधील कष्टाचे जीवन तो ज्या मनस्थितीमध्ये जगत असेल त्यात सुखापेक्षा अनंतपटीने अधिक दुःखच त्याला भोगावे लागत असणार. शिवाय "सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे।" असे तुकाराम महाराज सांगून गेले आहेत. दोस्ती या चित्रपटातील एका प्रसिद्ध गाण्यात "राही मनवा दुखकी चिंता क्यूँ सताती है। दुख तो अपना साथी है।। सुख तो इक छाँव ढलती आती है जाती है।" असे मजरूह सुलतानपुरी यांनी म्हंटलेले आहे. सुख हे कधीकधी येते, दुःख मात्र पांचवीलाच पूजलेले असते, असा अनुभव अनेक जणांना येतो. भरपूर कष्ट केल्यानंतर कुठे त्याचे फळ मिळते, महिनाभर राबल्यानंतर पगाराचा एक दिवस येतो, वगैरे सांगायची गरज नाही. त्यामुळेच या गाण्यातला नायक म्हणतो,

एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे ।
जरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे ।।
या गीतामध्ये जीवनालाच 'वस्त्र' असे म्हंटले आहे."वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृण्हाति नरोपराणि। तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही।।" या श्लोकात मानवाच्या शरीराला वस्त्राची उपमा देऊन, "प्रत्येक जीवाचा आत्मा ते वस्त्र पांघरून वावरत असतो, एक जन्म संपताच जुने कपडे अंगावरून उतरवून नव्या जन्मात नवे कपडे परिधान करतो." असे भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे. याच्याही एक पाऊल पुढे जाऊन केवळ शरीराऐवजी 'आयुष्य' हेच एक वस्त्र असे मानण्यामध्ये त्या शरीराबरोबरच त्या जीवाच्या जीवनामधील इतर गोष्टीही येतात. "कान्होबा, तुझी घोंगडी चांगली। आम्हासि कां दिली वांगली।।" असे संत ज्ञानदेव म्हणतात, किंवा "चदरिय़ा झीनी झीनी रे।" असे कबीर म्हणतात ते याच अर्थाने. यामुळेच "मैली चादर ओढके कैसे द्वार तिहारे आऊँ।" असे एका भजनात भक्ताने भगवंताला विचारले आहे. त्याच अर्थाने सुख आणि दुःख यांच्या धाग्यांमधून आयुष्याचे वस्त्र विणले जात आहे असे कवी 'एक धागा सुखाचा' या गीतात म्हणतो.

वरवर पहाता हे एक रडगाणे वाटेल. पण खोलवर विचार करता त्यातील सकारात्मक अंतःप्रवाह अधिक महत्वाचा असल्याचे लक्षात येईल. शंभर दुःखाच्या धाग्यांमध्ये एक सुखाचा धागा या प्रमाणात विणलेले कापड दुःखमयच होणार. पण जरीच्या एका कांठानेच एकादे लुगडे किंवा धोतर 'जरतारी' बनते. त्यातून जर शंभर दुःखाचे धागे घेऊन एकाच जरीच्या धाग्याने विणले तर ते संपूर्ण वस्त्रच 'भरजरी' होते. तेंव्हा 'एक धागा सुखाचा' हा दुःखाच्या शंभर धाग्यांनी विणलेल्या वस्त्रालासुद्धा 'जरतारी' बनवतो याला महत्व आहे.

पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा, जासी उघडा ।
कपड्यासाठी करिसी नाटक, तीन प्रवेशांचे ।।
माणसाचे आयुष्य त्याच्या जन्मापासून सुरू होते आणि मृत्यूच्या वेळी संपते. त्यामुळे जेंव्हा तो जन्माला येतो त्याच क्षणी हे वस्त्र विणण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यापूर्वी ते अस्तित्वात नसते आणि मरणानंतरही ते नष्ट झालेले असते. त्यामुळे त्या वेळेस आत्मा वस्त्राविनाच असतो. पण या दोन्हीमधल्या काळात आयुष्य जगण्यासाठी तो जी धडपड करतो ती एका नाटकापेक्षा कमी नसते. त्यात तो विविध भूमिकांमधून जगत असतो. त्यात कुठकुठले रोमहर्षक नाट्यमय प्रसंग, कसकसले अनुभव त्याच्या वाट्याला येतात? या नाटकाच्या तीन अंकांबद्दल पुढील चरणात विस्ताराने सांगितले आहे.

मुकी अंगडी बालपणाची, रंगित वसने तारुण्याची ।
जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे ।।
बहुतेक लोकांचे लहानपण त्यांच्या घरी आईवडिलांच्या प्रेमळ छायेत जाते. लहान बाळांची आईच त्यांना हौसेने अंगडी टोपडी घालून, तीटकाजळ वगैरे लावून मायेने सजवते. त्यांना स्वतःला कांही करण्याचे फारसे स्वातंत्र्य नसते, म्हणून ती 'मुकी'. पण त्यांच्याकडे पालकांच्या मायेची पाखर आणि संरक्षणाचे कवच असते. आयुष्याच्या सुरुवातीचा हा सगळा काल 'मुकी अंगडी' या शब्दांत येतो. तारुण्यामध्ये माणूस मनासारखे वागून आपल्याला हवी तेवढी मौज करून घेऊ शकतो. त्यामुळे अंगड्याचे रूपांतर रंगीबेरंगी पोशाखात होते. म्हातारपणी अंगातली रग आणि शक्ती क्षीण होते. पण त्याच्या आयुष्याची वस्त्रे जीर्ण झाली तरी त्यांची 'शाल' झालेली असते आणि ते वार्धक्याचे 'लेणे' असते. या शब्दप्रयोगावरून कवीचा सकारात्मक दृष्टीकोन स्पष्ट दिसतो.

या वस्त्राते विणतो कोण ? एक सारखी नसती दोन ।
कुणा न दिसले त्रिखंडात त्या, हात विणकराचे ।।
जगामधील अब्जावधी माणसांची आयुष्ये कशा रीतीने चालत असतात? त्यांच्या जीवनाची वस्त्रे कुठल्या मागावर कोणता अदृष्य विणकर सारखा विणत असतो? त्या सर्वांचे पोत वेगळे, रंग निराळे, तऱ्हातऱ्हांचे नक्षीकाम त्यांवर चितारलेले! असा हा अजब कारीगर परमेश्वराखेरीज आणखी कोण असू शकेल? असे अप्रत्यक्षरीत्या त्याची प्रशंसा करणारे उद्गार काढून हे गीत संपते. या गीताच्या मुख्य विषयावरील माझे विचार या लेखाच्या उत्तरार्धात मांडीन.

. . . . . . . . . . . . . . . . . 

  • एक धागा सुखाचा  (उत्तरार्ध)






"एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे।" असे आपल्याला खरेच नेहमी वाटते कां? "तुम्ही कसे आहात?" किंवा "तुमचं कसं चाललंय्" असे आपण कुणालाही विचारतो तेंव्हा तो "ठीक आहे", "बरं चाललंय्" असे म्हणतो. तेंव्हा सरसकट सगळ्या लोकांनी "शंभर धागे दुःखाचे" असे म्हणणे कितपत बरोबर आहे? ते ठरवण्यापूर्वी इतर कांही प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. "सुख कशाला म्हणायचे आणि दुःख म्हणजे नेमके काय?", "त्यांचे मोजमाप कसे करणार?", "त्याची बेरीज वजाबाकी करून हिशोब मांडता येईल कां?" अशा प्रश्नांची समर्पक उत्तरे त्यासाठी आवश्यक आहेत. पण जरी कोणाला कधी ती मिळाली तरी इतरांना ती
पटतील असे वाटत नाही.

सुखी माणसाचा सदरा शोधणा-या राजाची गोष्ट सर्वांना माहीत आहे. "सुखी माणसाचा सदरा अंगात घातलास तर तू सुद्धा सुखी होशील." असा सल्ला मिळाल्यानंतर तो राजा आपल्या सर्व राज्ययंत्रणेला तो सदरा शोधून आणण्याच्या कामाला लावतो. त्याचे शिपाई राज्यामधील प्रत्येक माणसाकडे जाऊन "जगी सर्वसुखी असा कोण आहे?" अशी विचारणा करीत सुटतात. पण प्रत्येक नागरिक तो कोठल्या ना कोठल्या दुःखाने ग्रस्त असल्याचे सांगतो. अखेरीस घनदाट जंगलात राहणारा एक माणूस सुखी असल्याचे त्यांना समजते, पण त्या दरिद्री माणसाने आयुष्यात कधी अंगात सदरा घातलेला नसतो. त्यामुळे राजाला देण्यासाठी त्याच्याकडे सदराच नसतो. या गोष्टीवरून त्या राजाने कोणता बोध घेतला आणि तो 'सुखिया जाला' की नाही ते माहीत नाही. पण त्या दोघांच्या सुखाबद्दलच्या कल्पनांमध्ये जमीन आसमानाएवढा फरक नक्कीच असणार. त्यामुळे केवळ त्या रानातल्या माणसासारखा उघडाबंब राहिल्याने तो राजा सुखी होऊ शकला असता कां? अलीकडच्या काळात सलमानखानने मात्र या प्रकारे सुखी व्हायचे ठरवलेले दिसते!

दुस-या एका 'सुखी' माणसाची गोष्ट एकदा माझ्या वाचनात आली होती. तो रशियामधला एक थोर विचारवंत होता. एकदा तिथल्या शिपायांनी नामसादृश्यामुळे एका अट्टल गुन्हेगाराऐवजी त्यालाच पकडून नेले आणि कोठडीत टाकून दिले. जुलमी झारची राजवट असो वा कम्युनिस्टांची, दोन्हीमध्ये 'अंधेरनगरी चौपट राजा, टके सेर भाजी टके सेर खाजा' हाच खाक्या होता. या बाबतीत त्यांच्यात विशेष फरक नव्हता. त्या कैद्याच्या कोठडीमध्ये जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य पसरलेले होते. पण त्याला तिथे टाकून गेलेल्या पोलिसांची पाठ फिरताच तो माणूस लगेच कामाला लागला. जमीनीवर पसरलेला सगळा कचरा त्याने गोळा करून कशात तरी गुंडाळून व्यवस्थित कोप-यात ठेऊन दिला. कागदाचे कपटे, कापडाच्या चिंध्या वगैरे जे साधन हातात मिळेल, त्याने घासून भिंतीवरचे डाग काढले, खिडक्यांची तावदाने पुसली. खिडकीच्या बाहेर झुडुपांचे रान वाढले होते. त्यांवरच उमललेली चार रानफुले गजामधून बाहेर हात काढून तोडून घेतली आणि शोभेसाठी खोलीमध्ये मांडून ठेवली. संध्याकाळी निरीक्षण करायला आलेला तुरुंगाचा अधीक्षक त्या कोठडीचे पालटलेले रूप पाहून चकित झाला. कैद्याने स्मितहास्य करून आणि "गुड इव्हनिंग सर!" असे म्हणत त्याचे स्वागत केले.
त्याने कैद्याला विचारले, "तू कोण आहेस?"
आपले नांव सांगून "मी एक प्राध्यापक आहे आणि फुरसतीच्या वेळात पुस्तके लिहितो." ही माहिती दिली.
"मग तू या इथे काय करतो आहेस?"
"आपल्या शिपायांनी मला इथे आणून ठेवले आहे. आता इथून सुटका होईपर्यंत मला इथेच रहायचे आहे म्हणून मी आपल्या या नवीन घराची साफसफाई करीत होतो."
तेवढ्यात कैद्यांसाठी चहा आला. तोच कप अधिका-याला देत तो कैदी म्हणाला,"खरेच मी किती सुदैवी आहे? घरी आलेल्या पाहुण्याचा कांही पाहुणचार करता येणार नाही या गोष्टीची मला केवढी चुटपुट लागली होती. आता कृपया तुम्ही या चहाचा स्वीकार करावा अशी विनंती आहे."
जेलर पार गोंधळून गेला आणि म्हणाला, "अरे भल्या माणसा, तुला विनाकारण इथे आणले आहे असे तू म्हणतो आहेस, तुला इतके दुःख देऊनसुद्धा तू आनंदी कसा?"
"सर, भले कोणी मला दुःख देईल, पण मी ते घेऊन त्याला कुरवाळत बसायलाच पाहिजे कां? आपण आनंदात रहायचे की दुःख करत बसायचे हे स्वतःच ठरवावे असे मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो आणि पुस्तकात लिहितो. मलासुद्धा त्याप्रमाणे वागायला पाहिजे ना!"

महाकवी मंगेश पाडगांवकरांच्या काव्यवाचनाचा एक कार्यक्रम मी मागच्या महिन्यात पाहिला. त्यांच्या एका प्रसिद्ध कवितेची जन्मकथा त्यांनी सांगितली. एकदा ते एक इंग्रजी पुस्तक वाचत होते. त्या पुस्तकाचा लेखक आधी शाळामास्तर होता. परिस्थिती मनाजोगती नसल्यामुळे तो सतत चिडचिड करीत रहायचा. एकदा त्याच्या एका विद्यार्थिनीने वहीत लिहून आणलेली हकीकत वाचल्यानंतर त्याचा स्वभाव आमूलाग्र बदलला.
ती गोष्ट अशी होती. "आम्ही एक गाणारा पक्षी पाळला आहे. रोज संध्याकाळी आम्ही त्याला पिंज-याबाहेर काढून घरातल्या घरात उडू देतो. एके दिवशी तो उडता उडता कोठल्यातरी अडगळीत कडमडला आणि त्यात त्याचा एक पाय मोडला. माझ्या वडिलांनी त्याला हळूच उचलून पुन्हा पिंज-यात ठेवले. आम्ही यापेक्षा अधिक कांहीच करू शकत नव्हतो. तो पक्षी आता बहुतेक मरणार असेच आम्हाला वाटत होते. मला कांही त्या रात्री शांत झोप लागली नाही. मध्येच उठून मी त्या पक्ष्याला पहायला गेले. तो अजून जीवंत असलाच तरी मान टाकून निपचित पडलेला किंवा असह्य वेदनेने कळवळत असेल अशी माझी अपेक्षा होती. पण तो तर एक पाय लोंबकळत असलेल्या स्थितीमध्येसुद्धा चक्क नेहमीसारखे गोड गाणे गात होता."
ही गोष्ट वाचल्यानंतर पाडगांवकरांना शब्द सुचले, "सांगा, कसं जगायचं । कण्हतकुण्हत, कां गाणं म्हणंत, तुम्हीच ठरवा ।" तेंव्हा आपल्या आयुष्याच्या महावस्त्रातले धागे सुती असावेत कां रेशमाचे कां जरीचे हे ज्याने त्यानेच ठरवणे चांगले असते. त्यातील सुखकारक किंवा दुःखदायी घटना घडवून आणण्याचे काम तो अदृष्य विणकर करीत असेल. त्यावर आपल्याला नियंत्रण ठेवता येणार नाही. पण त्यावर आपली जी प्रतिक्रिया आपण करतो तिच्यावर आपण काबू मिळवला, आपण नेहमी सकारात्मक दृष्टीकोन बाळगला तर कदाचित शंभर धागे सुखाचे वाटतील. "सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे" असे म्हणणा-या तुकोबांनीच त्यानंतर "मन करारे प्रसन्न, मन सिद्धीचे कारण" असा उपदेश केलेला आहे तो यासाठीच.

2 comments:

Anonymous said...

Va !!
Yogya veli blog vaachla. Nirash zalo hoto pan aata nahiye. Dhanyavaad.

Anand Ghare said...

झटकून टांक जीवा दुबळेपणा मनाचा ।
फुलला पहा सभोती आनंद जीवनाचा ।।