Monday, September 14, 2020

तेथे कर माझे जुळती - भाग १९ - माझ्या आत्या


मला तीन सख्ख्या आत्या होत्या. सर्वात मोठ्या गंगूआत्या आमच्या जमखंडी गावातच रहात होत्या, मधल्या कृष्णाआत्या कल्याणला होत्या आणि धाकट्या सोनूआत्या आमच्यासोबतच रहायच्या. या वर्षातल्या पक्षपंधरवड्याच्या निमित्याने मी त्यांना ही शाब्दिक आदरांजलि वहात आहे.

गंगूआत्यांचे घर आमच्या घरापासून लहान गावाच्या मानाने थोडे दूर म्हणजे पंधरा मिनिटांच्या अंतरावर होते, पण तो रस्ता बाजारपेठेमधून आरपार जाणारा एक हमरस्ता होता. त्यामुळे आम्हाला तो फार लांब वाटत नव्हता. मी नेहमी त्यांच्या घरी जात येत होतो आणि ती मंडळीही नेहमी आमच्याकडे येत असत. आमचे जवळजवळ एकत्र कुटुंब असल्यासारखेच होते. आमच्या गंगूआत्या मनाने फारच चांगल्या होत्या. त्या शांत, सोज्वळ, प्रेमळ, स्वाभिमानी आणि कमालीच्या सोशिक व समजुतदार अशा होत्या. जुन्या मराठी सिनेमांमधल्या एकाद्या सुस्वभावी आदर्श आईसाठी सुलोचनाबाईंच्या जशा भूमिका असायच्या तशा आमच्या या आत्या प्रत्यक्षात होत्या. त्यांना प्रभावी चेहेऱ्याबरोबरच गोड आवाजाची देणगीही मिळाली होती. त्यांनी संगीताचे प्रशिक्षण घेतले नव्हते तरीही त्या भजने आणि जुनी गाणी अगदी तालासुरात गात असत आणि त्यांचे साधे गुणगुणणेसुद्धा मंजुळ वाटत असे .

आपले मोठे कुटुंब चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि त्यासाठी पडतील तेवढे कष्ट करून आणि त्या ती जबाबदारी खंबीरपणे आणि शांतपणे पेलत होत्या. मी लहान असतांना मला त्याचे महत्व समजत नव्हते, पण मला जाण येऊ लागल्यानंतर त्यांचे मोठेपण समजत गेले.  माझ्या लहानपणी आमच्या एकत्र कुटुंबात माझ्या चुलत बहिणी होत्या आणि माझा एक मावसभाऊही आमच्याकडे रहायचा. त्यात गंगूआत्यांची मुले आल्यावर घराचे गोकुळ होत असे. त्या काळात सख्खी, चुलत, मावस, आत्ते, मामे अशी सगळी भावंडे सगळ्यांसाठी सारखीच असायची. घरातले तसेच घरी आलेले सगळे मुलगे आपले भाऊ आणि सगळ्या मुली आपल्या बहिणी असायच्या. घरातली मोठी माणसेसुद्धा आमच्यात भेदभाव करत नव्हती. आमच्यातली ही आपुलकी पुढेही टिकून राहिली याचे श्रेय माझी आई आणि गंगूआत्या या दोघींना आहेच. त्यातही कुणावर न चिडता, न रागावता मुलांची शांतपणे समजूत घालण्याची अवघड कला गंगूआत्यांना चांगली अवगत होती.  त्यामुळे त्यांचा मोठा वाटा आहे. 

आमच्या गंगूआत्या कामाला वाघ होत्या, त्यांचा कामाचा उरक दांडगा होता. आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा, कुणा पूर्वजांचे श्राद्धपक्ष असे काही कार्यक्रम असले, कोणी पाहुणे आले किंवा दिवाळीचा फराळ करायचा असला तर अशा वेळी  मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करावा लागत असे. त्या वेळी गंगूआत्या पुढाकार घेऊन आणि गरज असल्यास मुलामुलींना हाताशी घेऊन हसत खेळत त्या सगळ्या कामांचा फडशा पाडत असत. स्वयंपाकघरातल्या अशा प्रकारच्या सामुदायिक मोहिमांची दृष्ये अजून माझ्या डोळ्यासमोर येतात.   

गंगूआत्यांचा मोठा मुलगा विद्याधर हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीता कामाला होता. त्यांच्या कंपनीला बीएआरसीतल्या एका मोठ्या बिल्डिंगचे काम मिळाले तेंव्हा विद्याधरची त्या कामावर नेमणूक झाली. त्यांच्यासाठी अणुशक्तीनगरमधल्या एका मोकळ्या जागेत लहानशी तात्पुरती वसाहत बांधली गेली आणि त्यात ते लोक रहायला आले. मी जमखंडी सोडल्यानंतर पंधरासोळा वर्षांनी पुन्हा एकदा गंगूआत्या आमच्या घराच्या जवळ रहायला आल्या आणि आमचे नेहमी एकमेकांकडे जाणेयेणे सुरू झाले. आता त्या प्रेमळ आजीच्या भूमिकेत आल्या होत्या आणि आमच्याबरोबर माझ्या मुलांनाही  त्यांची माया मिळाली. त्या काळात माझी आईही आमच्याकडे रहात होती. त्या दोघींचीही पुन्हा एकदा गट्टी जमली आणि जुन्या काळातल्या आठवणींची उजळणी होत राहिली. अशी तीन चार वर्षे मजेत गेल्यावर ते बीएआरसीमधले बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर गंगूआत्या आणि आपल्या कुटुंबासह विद्याधर डोंबिवलीला रहायला गेला, पण आम्हाला जमेल तसे आमचे एकमेकांकडे जाणे येणे होत राहिले.

माझ्या दुसऱ्या आत्या म्हणजे कृष्णाआत्यासुद्धा पूर्वीच्या काळी जमखंडीतच रहात होत्या असे मी ऐकले आहे, पण मला समजायला लागले तेंव्हापासून मात्र त्या मुंबईजवळील कल्याणला स्थाईक झाल्या होत्या. त्यांच्या कुटुंबाची कल्हळ्ळीच्या व्यंकटेशावर अपार श्रद्धा आहे. व्यंकोबाचे दर्शन घेण्यासाठी त्या मुलांसह अधून मधून जमखंडीला येत असत आणि त्यांचे आमच्याकडे काही दिवस माहेरपणही होत असे. प्रत्येक भेटीच्या वेळी त्यांचे अगत्याने स्वागत होत असे आणि त्याही घरातल्याच होऊन जात. तेंव्हा त्या कल्याण मुंबईच्या वेगळ्या शहरी जीवनाच्या गंमती जंमती तेवढ्या आम्हाला सांगत असत. त्यासुद्धा खूप प्रेमळ, अगत्यशील आणि मनमोकळ्या स्वभावाच्या होत्या. आमच्या लीलाताईचे म्हणजे माझ्या चुलत बहिणीचे लग्न दादरला करायचे ठरले तेंव्हा आम्ही सर्व मंडळी कल्याणला जाऊन कृष्णाआत्यांच्या घरातच उतरलो होतो आणि तिथले प्रत्यक्षातले शहरी जीवन पाहिले होते. पुढे मी शिक्षण आणि नोकरीसाठी मुंबईत आलो तेंव्हा कृष्णाआत्या आणि नाना माझे एक प्रकारचे स्थानिक पालक (लोकल गार्डियन) होते. वयपरत्वे त्यांना प्रवास करणे शक्य होत नव्हते, पण मी मात्र तीन चार महिन्यात अचानक कल्याणला एकादी चक्कर टाकून त्यांना भेटून येत होतो आणि हक्काने एकादा दिवस त्यांच्या घरी रहातही होतो. तेंव्हा माझेही अत्यंत प्रेमाने आणि अगत्याने स्वागत होत असे. पुढे मी संसाराला लागल्यावर त्याचे प्रमाण कमी कमी होत गेले.

माझ्या जन्माच्याही आधी आमच्या सोनूआत्यांना दुर्दैवाने वैधव्य येऊन त्या माहेरी परत आल्या होत्या आणि शिक्षण पूर्ण करून जमखंडीच्या मुलींच्या शाळेत शिक्षिकेचे काम करायला लागल्या होत्या. त्यांचे सासरचे आडनाव करंदीकर असले तरी गावात आणि शाळेतही त्यांना 'घारेबाई' याच नावाने ओळखले जात होते. त्या घरातली एक प्रमुख मोठी व्यक्ती म्हणून आमच्याबरोबर  रहात होत्याच, शिवाय त्यांची शाळा, तिथल्या इतर शिक्षिका आणि विद्यार्थिनी यांचे एक वेगळे विश्व होते. त्यांच्या त्या विश्वातली मुळगुंद सोनूताई आणि सुब्बाबाई ही नावे मला साठ वर्षांनंतर अजून आठवतात. सोनूआत्यांचा हा ग्रुप नेहमी भेटून काही ना काही प्लॅन करायचा. एकदा तर त्या मिळून भारताच्या सहलीवरसुद्धा गेल्या होत्या असे मला आठवते.

सोनूआत्यांकडे  विलक्षण  निरीक्षणशक्ती, आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती होती. त्या किती तरी जुन्या घटनांचे अतीशय बारकाईने तपशीलवार वर्णन करून सांगायच्या. त्यांना भेटलेल्या किंवा त्यांच्या माहितीतल्या माणसांची संख्या अमाप होती. "ही शांता म्हणजे आपल्या गोदीच्या नणंदेच्या जावेच्या मावसबहिणीची शेजारीण" अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या साखळ्या त्या बोलता बोलता सहजपणे उलगडून दाखवत आणि त्या नेहमी अचूक असत. मी तर त्यांना 'नात्यांचा काँप्यूटर' असेच म्हणेन. जमखंडीच्या लहान विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी काय नाते होते, इतकेच नव्हे तर त्यांचे आपसातले संबंध कसे होते हे त्यांना पक्के माहीत असायचे. त्यांना माणसांची चांगली पारख होती. "कुणीही काही सांगितले तर त्यावर भोळसटपणे विश्वास ठेवायचा नसतो. त्यामागे त्याचा काय हेतू असू शकेल हे आपण त्याला कळू न देता पहायला पाहिजे". वगैरेसारखी मॅनेजमेंटची तत्वे त्यांना चांगली माहीत होती हे त्यांच्या बोलण्या आणि वागण्यामधून अप्रत्यक्षपणे व्यक्त होत असे. लहान मुलांनी मोठे होत असतांना दुनियादारीसुद्धा शिकून घेणे कसे गरजेचे आहे याचे काही धडे आम्हाला त्यांच्याकडून मिळत गेले.      

सोनूआत्या नेहमी घरातल्या सर्वांशी अगदी मिळून मिसळून छान मजेत गप्पागोष्टी करत असत, पण त्यांचे टेंपरामेंट जरा वेगळे होते. त्यांचा पारा जरासा लवकर चढत असे आणि उतरतही असे. कदाचित त्यांच्या लहानपणी त्या घरातल्या सर्वात लहान असल्यामुळे सगळ्यांकडून त्यांची खूप काळजी घेतली जात असणार यामुळे असेल, पण कळत नकळत त्या फटकन दुखावल्या जाऊन त्यांचा मूड जाऊ नये अशी काळजी सर्वांकडून घेतली जात असे.  त्यांच्याशी बोलतांना जरा जपून बोलावे लागत असे. कदाचित त्या माझ्यावर कधीच रागावल्या नसतीलही, पण तरीही मला त्याचाच थोडा धाक वाटायचा. त्यांना घरकामाची किंवा स्वयंपाकपाण्याची मनापासून फारशी आवड नव्हती आणि त्या बाबतीत त्या विशेष पुढाकार घेत नव्हत्या. कदाचित त्या वेळी मला असे वाटणे चुकीचेही असेल, पण माझी लहानपणची आठवण अशीच आहे. 

माझ्या आत्यांना जावई, सुना, नातवंडे वगैरे पहायला मिळाली. माझ्या मनात त्यांच्या कितीतरी खूप जुन्या आठवणी आहेत, त्या सांगाव्या तितक्या कमीच आहेत. माझ्या संस्कारक्षम वयात माझ्या मनाची जी जडणघडण होत गेली त्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या आठवणी आल्यावर आज एवढेच म्हणावेसे वाटते, "तेथे कर माझे जुळती." 


Saturday, September 12, 2020

लास व्हेगासची सहल

 


पूर्वीच्या काळी संपर्काची आणि दळणवळणाची साधने फारच कमी होती. त्यामुळे अत्यावश्यक काम असले तरच लोक नाइलाजाने प्रवास करायचे. परगावी राहणाऱ्या लोकांची हालहवाल बहुतकरून फक्त टपालामधूनच कळायची. माझ्या लहानपणी तर आमचे घर, आमची शाळा, माझे मित्र आणि आमचे गाव एवढेच माझे अगदी पिटुकले जग होते. मला तरी त्याच्या पलीकडच्या जगाची अतीशय पुसट अशी कल्पना होती.  

त्या काळात क्वचित कधी तरी शाळेतला एकादा मुलगा काही कारणाने मुंबईला जाऊन यायचा. तिथे तो एकाद्या चाळीत राहणाऱ्या नातेवाइकाकडेच जायचा, पण तिथले लोक त्याला थोडी मुंबई दाखवायचे, म्हणजे राणीची बाग, हँगिंग गार्डन, राजाबाई टॉवर, गेटवे ऑफ इंडिया वगैरे आणि जातायेतांना बोरीबंदर आणि फ्लोरा फाउंटन अशी ठिकाणे दाखवायचे, एकादे वेळा त्याला चौपाटीवरची भेळ आणि वीरकर किंवा तांबे अशांच्या हॉटेलातला बटाटा वडा, साबूदाणा वडा खायला घालायचे, एकादा सिनेमा दाखवून आइस्क्रीम नाहीतर शीतपेय घेऊन द्यायचे, लोकल ट्रेन, ट्रॅम आणि बेस्टच्या  बसमधून फिरवायचे. हे इतके सगळे करणे म्हणजे आमच्या दृष्टीने चैनीची अगदी पराकाष्ठा होती आणि त्याला 'जिवाची मुंबई करणे' असे म्हणत असत. तो मुलगा परत आल्यावर या सगळ्या गंमती रंगवून सांगत रहायचा, यातले काहीच न अनुभवलेली बाकीची सगळी मुले ते वर्णन कान टवकारून आणि डोळे विस्फारून ऐकत आणि त्या मुलाचा हेवा करत असत.

आता लहान गावांकडली परिस्थितीसुद्धा पार बदलली आहे, सर्वांच्या घरात टीव्ही आणि खिशात स्मार्टफोन आले आहेत त्यावर त्यांना सगळे जग दिसते, गावातच सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थही खायला मिळतात आणि तिथले लोकसुद्धा पर्यटन करण्यासाठी भरपूर इकडेतिकडे फिरायला लागले आहेत. त्यामुळे आता  'जिवाची मुंबई करणे'  हा मराठीतला वाक्प्रचारच नाहीसा झाला आहे.  

अमेरिका ही तर चंगळवादी राहणीमानाची जननी आहे. तिथे मौजमजा करण्यासाठी सगळ्या गावांमध्ये रेस्तराँ, पब्स, क्लब्स, पार्क्स,  रिसॉर्ट्स वगैरे तर असतातच, अनेक ठिकाणी खास प्रकारचे अॅम्यूजमेंट पार्क असतात. अमेरिकेतले लोक जरा मोकळा वेळ मिळाला की कुठे जाऊन कशी धमाल करायची याचा विचार करतात. त्यांनी तर फक्त मौजमजा करण्यासाठी 'लास व्हेगास' या नावाचे एक शहरच बांधले आणि गेल्या काही दशकांमध्ये त्या नगराची सर्वाधिक वेगाने वाढ झाली आहे. अमेरिकेतलेच नव्हे तर जगभरातले शौकीन लोक पैसे उधळून मजा करण्यासाठी त्या गावाला भेट देत असतात. या मौजमजेत जुगार, दारू आणि  निशाजीवन यांना प्राधान्य असल्यामुळे या गावाला 'सिनसिटी' असे टोपणनाव पडले आहे.

परमेश्वराने या जगाची अशी रचना केली आहे की 'ब्रह्म आणि माया' या द्वयीतल्या परब्रह्माची ओढ फक्त काही महान संतमहात्म्यांनाच लागते आणि बाकी सगळ्या सर्वसाधारण लोकांवर मायाच भुरळ  घालते. त्यामुळे लासव्हेगासची कीर्ती ऐकल्यावर मलाही आपण एकदा ते शहर पहायला हवे असे वाटायला लागले होते. माझ्याकडे उधळण्यासाठी जास्तीचे पैसे नसले तरी पैसेवाले इतर लोक तिथे जाऊन कशा प्रकारची वेगळी मौज करतात याचे मला मोठे कुतूहल होते. 


मागच्या वर्षी मी अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसजवळील टॉरेन्स या गावात मुलाकडे गेलो होतो. तिथून हे लास व्हेगास शहर कारने फक्त चार तासांच्या अंतरावर होते आणि तिथे राहणाऱ्या सगळ्या लोकांचे ते आवडते सहलीचे ठिकाण होते. माझा मुलगासुद्धा तिथे एकदा सहकुटुंब फिरून आला होता, पण त्यावेळी काही अडचण आल्यामुळे त्यांची ती ट्रिप मनाजोगती झाली नव्हती. मी तिथे असतांना ते शहर मलाही दाखवावे म्हणून त्यांनी पुन्हा लास व्हेगासला जाऊन यायचा बेत आखला. डिसेंबरच्या २६ आणि २७ तारखांच्या रात्री तिथल्या एका चांगल्या हॉटेलात रहायचे रिशर्वेशन मिळाले. आधी हूव्हर डॅम पाहून संध्याकाळपर्यंत लास व्हेगासला जाऊन पोचायचे, ती संध्याकाळ, रात्र आणि दुसरा पूर्ण दिवस 'जिवाचे लास व्हेगास' करून घ्यायचे असा विचार होता. 

पण त्या दिवशी घरातून निघता निघता दुपार होऊन गेली म्हणून हूव्हर डॅमला न जाता सरळ व्हेगासला जायले ठरवले. कारमधल्या जीपीसच्या सांगण्याप्रमाणे ते अंतर सुमारे साडेतीनशे मैल आणि लागणारा वेळ चार तास असे दिसत होते. त्यानुसार आम्ही संध्याकाळी पाचच्या सुमाराला तिथे पोचू अशी अपेक्षा होती. टॉरेन्सहून उत्तरेच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गाला लागल्यावर थोड्याच वेळात दूर क्षितिजावर हिमाच्छादित शिखरे दिसायला लागली. टॉरेन्सला बर्फ पडण्यासारखी थंडी कधीच पडली नव्हती त्यामुळे आम्हाला ती दूरची शिखरे पाहूनच आधी छान वाटले. तासाभरानंतर आम्ही त्या डोंगराळ भागातूनच जायला लागलो आणि वरून हिमवर्षाव सुरू झाला. बर्फाचे ते कण भुरभुरत पडतांना पाहून आधी तर सगळ्यांना जास्तच मजा वाटायला लागली. 

 त्या महामार्गावरून तास दीड तास पुढे गेल्यानंतर  आमची गाडी  जीपीएसच्या आज्ञेनुसार एका लहान रस्त्याला लागली. तिथे अधून मधून दिसणाऱ्या दिशादर्शक पाट्यांवर कधी न ऐकलेल्या भलत्याच गावांची नावे दिसत होती. हा सगळा भाग पूर्वी स्पॅनिश लोकांनी भरलेला असल्यामळे त्या गावांची लॅटिन नावेही विचित्र वाटत होती. आपले काही चुकले आहे का ? अशी शंका आल्यामुळे मुलाने इंटरनेट, गुगल मॅप्स आणि जीपीएसवर तपासून पाहिले तेंव्हा असे लक्षात आले की अत्याधिक हिमवर्षावामुळे लास व्हेगासला जाणारा नेहमीचा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे आम्हाला शंभर दीडशे मैलांचा वळसा घालून तिथे पोचायचे होते आणि अर्थातच त्यासाठी दोनअडीच तासांचा जास्तीचा वेळ लागणार होता. व्हेगासला पोचायला तेवढा उशीर होणार असला तरी काही हरकत नाही असे म्हणत आम्ही पुढे जात राहिलो.

  त्या रस्त्याने पुढे जात असतांना आधी रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिमकणांची चादर पसरलेली दिसायला लागली आणि नंतर तर रस्ताच त्यांनी भरून गेला. बर्फावरून गाडी चालवली तर ती घसरण्याची शक्यताच नव्हे तर खात्री होती, त्यामुळे पुढे गेलेल्या गाड्यांच्या चाकांनी जेवढा भाग स्वच्छ करून त्यावर दोन काळे पट्टे ओढले होते त्या चाकोरीमधूनच आमची कार चालवणे भाग होते. त्यामुळे तो रस्ता रुंद असला तरी आता फक्त एकाच लेनचा झाला होता आणि त्यावरून जपून गाडी चालवायची असल्यामुळे तिचा वेगही कमी झाला होता.

आपल्याकडल्या महामार्गांवरून जातांनासुद्धा रस्त्यापासून थोड्या अंतरावर घरे, इमारती वगैरे दिसत असतात आणि तासा तासांच्या अंतरामध्ये अनेक हॉटेले, फूडमॉल्स, ढाबे वगैरे मिळतात. कॅलिफोर्नियाचा हा भाग मात्र पूर्णपणे निर्मनुष्य होता. रस्त्यामध्ये समोर पुढे जाणारी वाहने आणि उलट दिशेने आपल्याकडे येणारी वाहने सोडून माणसांचा कुठेही मागमूस दिसत नव्हता. जिकडे पहावे तिकडे बर्फ किंवा काही ठिकाणी उघडे बोडके डोंगर आणि काही ठिकाणची झाडी हेच दिसत होते. वाटेत गावेच नाहीत तर हॉटेले तरी कुठून असणार? तिथे वाटेत खायलाप्यायला काही मिळणार नाही याची आधीच कल्पना असल्यामुळे आम्ही वीस पंचवीस खाद्यपदार्थांची पाकिटे आणि तितक्याच पाण्याच्या बाटल्या डिकीमध्ये भरून आणि काही हाताशी ठेऊन निघालो होतो आणि ते खातपीत पुढे चाललो होतो. 

चार तासांचा असा प्रवास झाल्यावर एक विसाव्यावे ठिकाण दिसले म्हणून आम्ही त्याच्या समोर गाडी उभी केली. बाहेर जोरात हिमवर्षाव होत होता. आम्ही सर्वांनी आपापले ओव्हरकोट घालून स्वतःला नखशिखांत झाकून घेतले, हळूच कारचे दरवाजे उघडून बाहेर पडलो आणि निसरड्या रस्त्यावरून शक्य तेवढ्या झपझप त्या हॉटेलचे दार गाठले.  तिथे आत एक उंचापुरा, धिप्पाड आणि राकट माणूस बसलेला होता. अशा निर्जन ठिकाणी एकट्याने रहायला अशाच लोकांची गरज असते किंवा तेच तेवढी हिम्मत करू शकतात असे मला वाटून गेले. कदाचित तो रस्ता नेहमीच्या वहिवाटीचा नसावा यामुळे तिथे खाण्यापिण्यासाठी फारसे काही ठेवलेले दिसले नाही, ज्या थोड्या वस्तू होत्या त्या गारठून बर्फ झालेल्या होत्या. त्यातलीच दोन चार पाकिटे त्याने मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये गरम करून आम्हाला खायला दिली आणि वाफाळणाऱ्या गरम गरम कॉफीचे मग भरून दिले. 

त्याने अंगात थोडी ऊब आली. "तुम्ही लोक कुठे, व्हेगासला निघाला आहेत का?" त्या माणसाने चौकशी केली. आम्ही होकार दिल्यावर तो म्हणाला, "गुड लक !" ते ऐकून मला जरासे विचित्रच वाटले. तो असे का म्हणतोय् म्हणून आम्ही त्याला "तिथे सगळे ठीक आहे ना?" असे विचारले. त्याने मोबाईलवरच व्हेगासचे हवामान दाखवले. तिथेही हिमवर्षाव चालला होता आणि सगळे थोडेसे विस्कळित झाल्यासारखे दिसत असले तरी तसे ठीकठाकही वाटत होते. आम्ही आधीच चार तास बर्फातून प्रवास करत घरापासून इतके दूर आलो होतो आणि परत जाण्यापेक्षा पुढे जाऊन दोन अडीच तासात मुक्कामाला पोचायची अपेक्षा दिसत होती. "आलीया भोगाशी असावे सादर" असे म्हणत पुन्हा गाडीत जाऊन बसलो.  

आम्हाला हॉटेलमध्ये पोचायला उशीर होणार होता हे सांगण्यासाठी फोन लावायचा प्रयत्न केला. अमेरिकेतसुद्धा सिग्नलच्या रेंजचा प्रॉब्लेम असतोच. निरनिराळ्या मोबाइल फोनवरून अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतर तो एकदाचा लागला. तिथल्या बाईंनी सांगितले की ते लोक आमचे रिझर्व्हेशन मध्यरात्रीपर्यंत आणखी कुणाला देणार नाहीत. ते ऐकून हायसे वाटले कारण आम्ही त्याच्या आधीच तिथे पोचणार याची आम्हाला खात्री वाटत होती.

तोपर्यंत दिवसही मावळून गेला होता आणि रस्त्यावरील गाड्यांच्या दिव्यांशिवाय कुठलाही उजेड दिसत नव्हता. सगळे डोंगर आणि झाडे अंधारात गुडुप झाले होते. त्या लहान रस्त्याने पुढे गेल्यावर एक मोठा रस्ता लागला, पण त्यावरून थोडेच पुढे गेल्यावर आम्ही दुसऱ्या एका लहान रस्त्याला लागलो. या रस्त्यावरून खूप गाड्या जात होत्या हे पाहून आधी थोडे बरे वाटले, पण पुढे गेल्यावर नजर पोचेल तिथपर्यंत गाड्यांच्या दिव्याची रांग दिसायला लागली आणि त्या गाड्यांची गति मंद मंद होत होत ती अगदी गोगलगायीसारखी झाली. तासाभरामध्ये आम्ही पाच मैलसुद्धा पुढे सरकत नव्हतो. हा ट्रॅफिक जॅम संपायची काही लक्षणेच दिसत नव्हती आणि त्या आडरानात काही माहिती सांगणारेही कोणी नव्हते. काही गाड्या उलट दिशेने जातांना दिसत होत्या. त्यामुळे हा रस्ता सुरू तर आहे असे वाटत होते, पण नंतर असे लक्षात आले की आमच्या दिशेने जात असलेल्या काही गाड्याच परत फिरून जात होत्या आणि त्यांनी व्यापलेली जागा रिकामी होत असल्यामुळे आम्ही हळूहळू पुढे सरकत होतो.

उलट दिशेने जात असलेल्या एका गाडीमधल्या सज्जनाने वेग कमी करून आणि ओरडून सांगितले की आमचा तो रस्ता पुढे बंद केला आहे आणि व्हेगासला जाणाऱ्यांनी परत फिरून अमक्या तमक्या मार्गाने जावे. त्यामुळे आम्हीही परत फिरायचे ठरवले, पण रस्त्यातल्या डिव्हायडर्समुळे मागे फिरणेही अशक्यच होते. हळूहळू पुढे सरकत एका ठिकाणी काही गाड्या वळून परत फिरतांना दिसल्या, त्यांच्या मागोमाग आम्हीही यू टर्न घेतला आणि जीपीएसला वेगळ्या मार्गाने जाण्याची सूचना दिली.  खरे तर आम्ही व्हेगासहून ऐंशी मैलावर पोचलो होतो, पण या तिसऱ्या रस्त्याने त्यात आणखी दीडशे मैलांची भर पडली.

आता आम्हाला दुसरी चिंता वाटायला लागली. आम्ही निघतांना गाडीच्या तेलाची टाकी फुल्ल भरून घेतली होती आणि ती व्हेगासपर्यंत सहज पुरेल असे वाटले होते, पण आता ती रिकामी होण्याच्या मार्गावर होती आणि पुन्हा भरून घेणे आवश्यक झाले होते. अमेरिकेतल्या जीपीएसमध्ये अशी सोय आहे की त्यात जवळची गॅस स्टेशन्स कुठे आहेत ते दाखवतात. आम्ही आता ती शोधायला सुरुवात केली. सुदैवाने पंचवीस तीस मैलांवर एक गाव लागले. त्या रस्त्यावरल्या सगळ्या प्रवाशांची आमच्यासारखीच परिस्थिती असल्यामुळे तिथल्या गॅस स्टेशनवर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. पण ते गाव सोडून दुसरीकडे जायचे झाले तर आणखी कुठे डिझेल मिळाले असते कुणास ठाऊक ? त्यामुळे वाट पाहण्याशिवाय आमच्याकडे काही गत्यंतरच नव्हते. अर्धापाऊण तासानंतर आमचा नंबर लागला आणि सुदैवाने त्या पंपवाल्याकडे भरपूर साठा असल्यामुळे आम्हाला गाडीत इंधन भरायला मिळाले. तोपर्यंत मध्यरात्रही होऊन गेली होती. आम्ही आपापल्या पोटाच्या टाक्याही भरून घेतल्या आणि गरज पडली तर रस्त्यातल्याच एकाद्या मोटेलमध्ये रात्र काढावी का अशी चर्चा करत पुढे जात राहिलो.     

तासाभरानंतर आम्हाला लास व्हेगासकडे जात असलेला एक महामार्ग लागला आणि लास व्हेगास अमूक इतके मैल असे दाखवणाऱ्या पाट्याही दिसायला लागला. आता या रस्त्यावर गाड्याही वेगात जात होत्या. आम्ही अखेर एकदाचे ट्रॅफिक जॅममधून बाहेर पडलो होतो. सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मुलाला आणि सुनेला बारा तासाहून अधिक वेळ ड्राइव्ह करत राहण्याचा ताण झालेला असला तरी आता अंगात थोडा उत्साह आला. लास व्हेगास शहरात शिरल्यानंतर तिथल्या चित्रविचित्र पण आकर्षक अशा भव्य इमारती दिसायला लागल्या. त्यांच्यावर केलेल्या नेत्रदीपक रोशणाईने त्या झळाळत होत्या. त्यांना पाहून सगळ्यांना हुरुप वाटायला लागला. अखेर रात्री दोनच्या सुमाराला आम्ही आमच्या गंतव्य स्थानी जाऊन पोचलो.    

आम्ही ज्या लक्झर हॉटेलचे बुकिंग केले होते त्याचा आकार एका अवाढव्य पिरॅमिडसारखा आहे. तो दुरून दिसायला लागला होता. काही मिनिटांमध्येच आम्ही तिथे पोचलो आणि गाडी पार्क करण्यासाठी भूमीगत (अंडरग्राउंड) पार्किंग लॉटमध्ये शिरलो. त्या अवाढव्य जागेत हजारो गाड्या शिस्तीत लावलेल्या होत्या, पण सगळीकडे फिरूनही एकही रिकामा गाळा दिसला नाही. कंटाळून रिसेप्शनला फोन लावला. त्यावर आम्हाला जमीनीवरील उघड्या (ओपन एअर) पार्किंग लॉटमध्ये जाण्याची सूचना मिळाली. तिकडे जाण्याचा मार्ग शोधत बाहेर पडलो. तिथेही हजारो गाड्या उभ्या केलेल्या होत्याच. पण त्या मैदानात जायच्या आधी हॉटेलच्या इमारतीत शिरण्याचा एक मागचा दरवाजा दिसला. बाहेरील कडाक्याची थंडी पाहता आम्ही आपले सामान घेऊन कारच्या बाहेर पडलो आणि त्या दरवाजातून आत शिरलो आणि फक्त मुलगा एकटाच गाडी पार्किंग करायला पुढे घेऊन गेला. 


आम्ही त्या दारातून आत शिरून पाहिले तर समोर एक मोठा कॉरीडॉर होता. आधी तिथले प्रसाधनगृह (वॉशरूम) शोधून काढले. फ्रेश झाल्यावर तिथेच मुलाची वाट पहात उभे राहिलो. तो आल्यावर आता कुठे जायचे हा प्रश्न होताच. तिथे कुणाला विचारायला कुणी माणूस तर दिसायला हवा ना ! सामान घेऊन त्या कॉरीडॉरमधून इकडे तिकडे पहात हळू हळू पुढे जात जात अखेर एकदाचे चेक इन काउंटर सापडले. रात्री अडीच वाजतासुद्धा त्याच्यासमोर प्रवाशांची भली मोठी रांग होती. तसे पाहता त्या काउंटरवर फक्त एक नंबर दाखवला की पुढची सगळी क्रिया काँप्यूटरवरून होत होती, तरीही त्या कामाला एकादे मिनिट तरी लागणारच.  अर्धा पाऊण तासांनी आम्हाला आमच्या खोल्यांचे नंबर आणि किल्ल्या मिळाल्या.  साडेचाार हजार खोल्या असलेल्या त्या टोलेजंग हॉटेलमधली आपली खोली शोधून काढणे हे सुद्धा एक दिव्यच होते, पण त्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या पाट्या आणि दिशा दाखवणारे बाण सगळीकडे लावलेले होते. ते पहात पहात आम्ही आमच्या खोल्यांपर्यंत पोचलो.

आत छान प्रशस्त पलंगांवर पसरलेल्या मऊ मऊ गाद्या आमची वाटच पहात होत्या. अंगावरचे ओले ओव्हरकोट काढले, भिजलेले कपडे बदलले आणि त्या गाद्यांवर अंग झोकून दिले. तोपर्यंत पहाटेचे साडेतीन वाजून गेले होते. आदले दिवशी प्रवासात दमून गेले असल्यामुळे सगळेजण सकाळी आरामात उठलो आणि सकाळची कामे आटोपली. त्या हॉटेलमध्ये रूमसर्व्हिसची व्यवस्था दिसली नाही आणि ती असली तरी त्यात वेळ आणि पैसे खर्च होतील म्हणून आम्हीसुद्धा तिचा विचार केला नाही. तयार झाल्यावर आमच्या शिदोरीमधूनच चार घास खाऊन घेतले आणि खाली उतरलो.


लास व्हेगासचे हे लक्झर हॉटेल इजिप्शियन संस्कृतीच्या थीमवर बांधले आहे. इथे एका प्रचंड आकाराच्या पिरॅमिडमध्ये अनंत गेमिंग मशीन्स, कॉसिनोज, बार्स, दुकाने, कॉफीशॉप्स वगैरे मांडले आहेत. बाहेरच्या बाजूला एका पुरातन इजिप्शियन बाईचा  प्रचंड आकाराचा पुतळाही आहे. आत ठिकठिकाणी जुन्या काळातल्या इजिप्शियन राजाराण्यांचे आणि त्यांच्या दासदासींचे पुतळे ठेवले आहेत आणि त्याला साजेशीच विशिष्ट प्रकारची सुरेख सजावट सगळीकडे केली आहे. त्यांची माहिती देणारे फलकही जागोजागी ठेवले आहेत. या हॉटेलचा तळमजला म्हणजे एक प्रकारचे प्रदर्शनच आहे.  ते पहात पहात आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो.

लास व्हेगासच्या गजबजलेल्या भागाला 'स्ट्रिप' असे नाव आहे.  आमचे हॉटेल या स्ट्रिपवरच होते. त्यामुळे बाहेरच्या रस्त्यावर येताच पर्यटकांचे थवे तिथे हिंडतांना दिसायला लागले. त्या दिवशी मात्र आमचे दैव चांगले होते. आदल्या दिवशी आमचा पिच्छा पुरवणारा हिमवर्षाव थांबला होता आणि थोडे ऊन पडले होते. त्यामुळे वातावरण प्रसन्न होते. त्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना एकाहून एक सुंदर अशा भव्य इमारती होत्या. त्या बहुतेक टोलेजंग हॉटेलांच्या होत्या. शिवाय कुठे मॅनहॅटनमधल्या इमारती आणि स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा यांच्या प्रतिकृति असलेला न्यूयॉर्कचा देखावा तर कुठे आयफेल टॉवरसकट पॅरिस नगरीचा देखावा उभा केला होता. सगळीकडे ख्रिसमससाठी भरपूर सजावट केलेली होतीच.  तिथे सगळ्या खंडांमधले निरनिराळ्या वंशाचे आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक निरनिराळ्या चित्रविचित्र पोषाखांमध्ये दिसत होते. त्यात कोणी लालबुंद गोरे, कोणी काळे कुळकुळित, कोणी पीतवर्णीय, कोणी ताडमाड उंच तर कोणी अतीशय बुटके, कोणी गलेलठ्ठ, कोणी काटकुळे, कोणी म्हातारे, कोणी तरुण, कुणाबरोबर लहान लहान मुले अशा सगळ्यांचा त्यात समावेश होता, पण सगळ्यांच्या अंगातून पुरेपूर उत्साह आणि उत्सुकता ओसंडून वाहतांना दिसत होती. 


या बहुतेक सगळ्या इमारतींमध्ये खालच्या एक दोन मजल्यांवर तरी असंख्य प्रकारची दुकाने होती. आपल्या वस्तू अत्यंत आकर्षकपणे मांडून पहाणाऱ्याला त्या घ्यायच्या मोहात पाडण्यामध्ये तर अमेरिकन लोक वाकबगार आहेतच. म्हणजे हा सगळा भाग एक अवाढव्य असे प्रदर्शन आणि गजबजलेला बाजारच होता. त्यात इकडेतिकडे पहात पहात फिरणाऱ्यांची अर्थातच खूप गर्दी होती.  आम्हीसुद्धा कधी दुकाने आणि कधी माणसे यांच्याकडे पहात पहात आणि त्यांच्यावर कॉमेंट्स करत पुढे पुढे जात होतो. काही रस्त्यांवर म्हणजे फुटपाथवर ऐसपैस मोकळी जागा होती. तिथे गाणी म्हणणारे, वाद्ये वाजवणारे, नाच करणारे, जादूचा खेळ करणारे, हसवणारे विदूषक असे नाना प्रकारे मनोरंजन करणारे कलाकार आपापले खेळ दाखवत होते. त्यात काही तर उघडपणे सवंग देहप्रदर्शन करणाऱ्या बायासुद्धा होत्या.


यातल्या काही काही पॅव्हेलियन्सना खास थीम्स होत्या. त्यातल्या माझ्या विशेष लक्षात राहिलेल्या एका इमारतीत रोमच्या वेगवेगळ्या सीजर्सचे पुतळे निरनिराळ्या दालनांमध्ये उभे करून ठेवले होते आणि त्यांची माहिती दिली होती, तसेच रोमन प्रकारचे नक्षीकाम आणि साजेशी सजावट केली होती.  त्यातल्या प्रत्येक दालनाला त्या सम्राटाचे नाव दिले होते. बहुतेक ठिकाणी ख्रिसमस ट्री आणि रेनडीयर्सची गाडी वगैरेसारख्या गोष्टी होत्याच. एका ठिकाणी ख्रिसमससाठी एक खास देखावा उभा केला होता. त्यात पाश्चात्य लोकांच्या पुराणातले काही प्रसंग होते. तो हॉल मात्र अप्रतिम होता आणि तो पहाणाऱ्यांची गर्दीसुद्धा खूप होती. एका भागातल्या गोल छतावर संपूर्ण कृत्रिम आभाळ तयार केले होते. त्यात फिरणारे ढगसुद्धा हुबेहूब दाखवले होते. त्यामुळे बाहेर दिवस आहे की रात्र हेसुद्धा समजत नव्हते.

लास व्हेगास म्हणजे जुगाऱ्यांची पंढरी आहे. केवळ जुगाराच्या धुंदीचा अनुभव घेण्यासाठीच खूप लोक तिथे जातात. तिथे त्यांच्यासाठी जिकडेतिकडे जुगाराची यंत्रे म्हणजे स्लॉट मशीन्स, गेमिंग मशीन्स, रौलेट व्हील्स वगैरे पसरून ठेवलेली दिसतात. कल्पक लोकांनी असंख्य प्रकारची असली यंत्रे तयार केली आहेत. त्यातली काही एकेकट्याने स्वतंत्रपणे चालवायची असतात तर काहींमध्ये पाचदहा लोक सामूहिकपणे जुगार खेळतात. आपल्याकडे काही मॉल्समध्ये अलीकडे अशी यंत्रे ठेवतात. त्यात टोकन टाकून काही बटने दाबायची किंवा खुंट्या फिरवायच्या आणि आपला आकडा लागला तर लहान मोठे बक्षिस मिळते. पण ते क्वचितच होते, बहुतेक वेळा नंबर लागतच नाही आणि आपले पैसे वाया जातात. कधी कधी एकादे बक्षिस लागले की खेळणाऱ्याला हाव सुटते आणि तो जास्त जास्त पैसे टाकत जातो.  जुगार ही एक नशा असते आणि बहुतेक जुगारी लोक आपले पैसे त्यात गमावून बसतात. काही हुषार लोक त्यातही कमाई करतात, पण असे नशीबवान आणि योग्य वेळ येताच थांबणारे धोरणी लोक विरळाच दिसतात. 

माझ्या आधीच्या अमेरिकावारीत आम्ही ख्रिसमसला फ्लॉरिडामधील सेंट ऑगस्टीन नावाच्या गावी गेलो होतो. तिथेही थोडी मौजमस्ती धमाल होती, पण ती एकाद्या खेड्यातल्या जत्रेसारखी होती. तिथे छोट्या छोट्या किरकोळ वस्तू विकणाऱ्या लहान लहान दुकानांची, खाद्यपेयांच्या ढाब्यांची आणि त्यामधून फिरणाऱ्या सर्वसामान्य लोकांची गर्दी होती. त्याच्या तुलनेत लास व्हेगास म्हणजे एक मोठा जागतिक कुंभमेळा होता. इथला सगळा पसारा अवाढव्य आणि नेत्रदीपक होताच आणि ते पहायला जगभरातली पैसेवाली माणसे आली होती. त्यांना पहायला काही मध्यमवर्गीय लोक आलेले दिसत होते.  

हे सगळे पहात पहात आम्ही हॉटेलपासून चांगले चारपाच मैल तरी दूर गेलो होतो आणि दिवस मावळून रात्र पडली होती. आता मात्र पाय दुखायला लागले होते आणि मला दमल्यासारखे वाटत होते.  हॉटेलवर परत कसे जायचे याचीही काही कल्पना नव्हती. आमची कार तर आम्ही पार्किंगमध्येच उभी करून ठेवली होती आणि आम्ही पायी चालत निघालो होतो. अमेरिकेत रस्त्यावर उभी केलेली टॅक्सी, रिक्शा असली काही वाहने कुठे नसतातच. लास व्हेगासच्या या भाऊगर्दीत तर उबरसुद्धा मिळण्याची काही शक्यताही दिसत नव्हती. त्यामुळे मी आता आणखी पुढे न जाता परत कसे जायचे याचा विचार करायला सांगितले. 

स्ट्रिपवरून जाणारी एक इलेक्ट्रिक लोकल रेल्वे आहे असे ऐकले होते. गूगलवर त्याची माहिती काढली आणि आम्ही जिथे होतो तिथून जवळचे स्टेशन शोधून काढले.  ही लोकल डोक्यावरून जाणारी (ओव्हरहेड) होती. त्यामुळे ते स्टेशनही आकाशातच होते. तिथपर्यंत पोचल्यावर समजले की काही सुधारणा करण्यासाठी ते स्थानक तात्पुरते बंद ठेवले होते. मग तिथून चालत चालत पुढल्या स्टेशनपाशी गेलो आणि लिफ्टने वर जाऊन ते स्टेशन गाठले. तिथे एकच रेल्वेमार्ग होता. त्यामुळे जी पहिली गाडी आली तिच्यात चढलो. गाडी सुरू झाल्यानंतर समजले की ती विरुद्ध दिशेने जात होती. उंचावरून जात असल्यामुळे आम्हाला दोन्ही बाजूला लास व्हेगासमधली झगमगणारी रोशणाई दिसत होतीच. ती पहात पहात दोन स्टेशने पुढे गेल्यावर ती गाडी मागे फिरली आणि चारपाच स्टेशने ओलांडल्यावर आमचे स्टेशन आले.

ते स्टेशन तिथल्या प्रसिद्ध एमजीएम हॉटेलच्या जवळ होते. आम्ही फिरतांना ते हॉटेल पाहिले होते आणि त्याच्या समोर असलेल्या भव्य सिंहाच्या पुतळ्यामुळे ते लक्षातही राहिले होते. रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्यावर समोरच्या बोगद्याकडे जाणाऱ्या वाटेवर 'एमजीएम हॉटेलकडे' असे लिहिले होते आणि दुसरीकडे जाणाऱ्या वाटेकडे आणखी काही तरी अनोळखी शब्द लिहिले होते. म्हणून आम्ही एमजीएम हॉटेलकडे चालायला लागलो. बरेच पुढे जाऊन लिफ्टने खाली आल्यावर पाहिले की तिथे एका महाप्रचंड अशा एका मैदानासारख्या पण बंदिस्त जागेत हजारो गेमिंग मशीने मांडून ठेवली होती आणि हजारो जुगारी त्यांच्या समोर बसून आपापले नशीब आजमावत होते. अख्ख्या जगात कुठेही इतक्या मोठ्या प्रमाणावर जुगार चालत असेल असे मला कधी वाटले नव्हते. तिथून बाहेर पडायचा मार्गही सापडत नव्हता. मग थोडी चौकशी करत करत आम्ही बाहेर आलो. पहातो तो बहुधा आम्ही जिथून आत शिरलो होतो त्याच जागी फिरून परत आलो होतो.  

दुसऱ्या बोगद्यातून पुढे गेल्यावर लिफ्टने खाली आलो तेंव्हा त्या सिंहांच्या बाजूलाच रस्ता होता. तिथून आमचे हॉटेल आणखी मैलभर लांब होते, पण तिथून जाण्यासाठी एक ट्रॅमची सोय होती आणि ती हॉटेलनेच केली असल्यामुळे मोफत होती. तिचा लाभ घेऊन आम्ही हॉटेलमध्ये परत आलो आणि मी तरी रूममध्ये जाऊन विश्रांती घेतली. बाकीची मंडळी आणखी थोडे फिरून आणि खेळून आली.

दुसरे दिवशी आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. वाटेत लास व्हेगासहून पंधरा वीस मैलांवर लागलेल्या एका हॉटेलात जेवण घेतले. ते माझ्या या वेळच्या अमेरिकेच्या प्रवासातले सर्वात मस्त आणि रुचकर जेवण होते. परतीच्या प्रवासात त्या मानाने बराचसा सरळ रस्ता मिळाला. वाटेत कुठे कुठे हिमवर्षाव होत होता, बर्फ पडून रस्ता बंद झाल्यामुळे वळसा घ्यावा लागणे वगैरे प्रकार झालेच, पण या वेळी आम्हाला ते अपेक्षित झाले होते. अशाच एका वळशावर बर्फाचे मोठमोठे ढीग साठले होते आणि काही मुले तिथे मजेत खेळत होती. ती येतांनाच त्यासाठी सगळी तयारी करून आली होती. आमच्या लोकांनी पण थोडा वेळ बर्फात खेळून लास व्हेगासच्या ट्रिपमध्ये मिळालेल्या या बोनसचा आनंद घेतला. 'ऑल इज वेल् दॅट एंड्स वेल्' या उक्तीनुसार आम्ही छान मूडमध्ये आनंदात घरी परतलो.   



Tuesday, September 01, 2020

गणेशोत्सवाच्या आठवणी

 


मला समजायला लागल्यापासून मी दरवर्षी येणारा गणेशोत्सव उत्साहाने साजरा करत आणि इतरांनी तसा केलेला पहात आलो आहे. या काळात आजूबाजूचे वातावरणसुद्धा आनंदाने भारलेले असायचे. जिकडे पहावे तिकडे सजवलेले मांडव दिसायचे आणि कानावर ढोल, ताशा, आरत्या, भजने, गाणी वगैरेंचे ध्वनि पडत असायचे. गणेशचतुर्थी आणि अनंतचतुर्दशीला सगळे रस्ते भक्तांच्या गर्दीने भरलेले असायचे. या वर्षी गणेशाची इच्छा वेगळी दिसली. कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक उत्सव फारसे साजरे झालेच नाहीत.  जे साधेपणाने आटोपून घेतले गेले ते सुद्धा मला पहायला मिळाले नाहीत,आमच्या  कारण घराबाहेर पडायलाच मनाई होती. या वर्षी मी फक्त आमच्या घरातल्या गणपतीचेच दर्शन घेऊ शकलो. आम्ही घरी आपला गणेशोत्सव दर वर्षीच्या इतक्याच उत्साहाने आणि त्याच परंपरागत रीतीने साजरा केला. पूजा, आरत्या, मोदकाचे नैवेद्य, अथर्वशीर्षाचे पठण वगैरे नेहमीसारखेच केले. मात्र गणपतीबाप्पाचे आगमन आणि विसर्जन साधेपणाने करावे लागले.

या दहा दिवसात मी रोज माझ्या जुन्या आठवणी काढून त्या शब्दबध्द करून फेसबुकवरील माझ्या फलकावर देत आलो. आज त्यांना एकत्र गुंफून या अनुदिनीवर देत आहे.  


गणेशोत्सवाच्या आठवणी - १

माझ्या लहानपणी आमच्या स्वैपाकघरातल्या एका उघड्या कपाटात एक छोटासा देव्हारा ठेवलेला होता आणि त्यात सगळे देव ठेवलेले होते. त्यात एक बाळकृष्णाची आणि एक अन्नपूर्णेची अशा दोन छोट्याशा मूर्ती होत्या आणि काळा शाळिग्राम तसेच नर्मदेतला शुभ्र गोटा असलेला महादेव होता. तो एका चांदीच्या नागाच्या वेटोळ्यात बसवलेला होता. त्या देव्हाऱ्यात गणपतीची मूर्ती नव्हती, गणपतीच्या नावाने एक लहानसा लाल रंगाचा चपटा आणि गुळगुळित असा सुबक खडा होता. या सर्वांची रोज भक्तीभावाने यथासांग पूजाअर्चा आरती वगैरे केली जात असे. याशिवाय इतर काही देवांची किंवा संतांची चित्रे होती, तसेच काही पोथ्या त्यांच्या बाजूला ठेवलेल्या होत्या. या सगळ्या गोष्टी कडक सोवळ्यात असायच्या आणि त्यांना कुणीही ओवळ्याने स्पर्श करणे पूर्णपणे निषिद्ध होते.

दर वर्षी गणेशोत्सवासाठी मातीची गणपतीची मूर्ती आणली जात असे. ती तयार करायचे काम आमच्या जमखंडी गावातल्या दत्तोबा तांबटाकडे होते. पोस्टावरून जाणाऱ्या गावातल्या हमरस्त्यावरच त्याचे वर्कशॉप होते. त्यात समोरच्या बाजूलाच एक लहानशी भट्टी होती आणि "ऐरणीच्या देवा तुला" या गाण्यात दाखवला आहे तसला तिचा भाता दत्तोबाची बायको खालीवर करत असे. फुललेल्या निखाऱ्यांवर तांब्यापितळेची भांडी तापवून दत्तोबा त्यांच्यावर ठोकाठोकी करत असे.  हे मी अनेक वेळा पाहिले असल्यामुळे अजून लक्षात आहे. त्याशिवाय तो इतर उद्योगही करत असे त्यात गणपतीच्या मूर्ती करणे हे मुख्य होते. त्याच्याकडे लहानमोठ्या आकाराचे काही साचे होते. शाडू मातीला चाळून, भिजवून, चांगली घोटून आणि त्यात चिकटपणा आणण्यासाठी काही द्रव्ये मिसळून तयार झालेला मऊसूत लगदा त्या साच्यांमध्ये थापून तो मूर्ती बनवायचा, त्यांना साच्यामधून काढून सुकत ठेवायचा आणि सुकल्यानंतर त्यांना ब्रशने रंगवायचा. हे सगळे काम आम्हाला रस्त्याने जाता येता दिसत असे आणि आम्हीही मुद्दाम तिथे थांबून त्याचे हस्तकौशल्य कौतुकाने पहात असू.

आम्ही दरवर्षी घेत असलेल्या गणपतीचा आकार ठरलेला होता. त्याबद्दल दत्तोबाला सांगायची गरजच नव्हती, उलट "हा बघा मी तुमचा गणपती करतोय्" असे तोच आम्हाला सांगून दाखवायचा.     


गणेशोत्सवाच्या आठवणी - २

आमच्या वाड्याच्या मोठ्या दरवाजातून आत आल्यावर उजव्या बाजूला बैठकीची खोली होती आणि डाव्या बाजूला न्हाणीघर, पाण्याचा हौद आणि लाकडे, कोळसे वगैरे ठेवायच्या जागा होत्या. त्यांना पार करून गेल्यावर समोर एक पायरी चढून वर पाच खणी सोपा होता. त्याच्या समोरच्या भितीवर मधोमध जागी कंबरेएवढ्या उंचीवर बराचसा खोल असा आमचा 'गणपतीचा कोनाडा' होता. एरवी त्याचा उपयोग आलेली पत्रे, बिले, पावत्या, सामानाच्या याद्या, औषधाची बाटली अशासारख्या गोष्टी लगेच मिळाव्यात म्हणून तात्पुरत्या ठेवण्यासाठी होत असे. गणपतीचे दिवस जवळ आले की तो कोनाडा स्वच्छ करून आणि चुन्याचा एक हात फिरवून गणपतीच्या आगमनासाठी सज्ज केला जात असे. आम्ही दरवर्षी आमच्या गणपतीबाप्पाची स्थापना त्या कोनाड्यातच करत असू.  गणपतीच्या एका बाजूला नारळ आणि दुसऱ्या बाजूला दिवा ठेवायला जागा सोडून उरलेल्या जागेत बसेल एवढ्याच आकाराची गणपतीची मूर्ती आणणे आवश्यक होते. म्हणून आम्ही साधारणपणे वीतभर रुंद आणि त्याहून थोडा उंच असा मूर्तीचा एक आकार ठरवून ठेवला होता आणि दत्तोबा तांबट दरवर्षी तेवढ्या आकाराची मूर्ती आमच्यासाठी तयार करून देत असे.



कोनाड्याच्या आत सजावट करायला फारशी जागा नव्हती आणि ती बाहेरून दिसलीही नसती म्हणून आम्ही एक सुंदर मखर तयार करून ते बाहेरच्या भिंतीवर टांगून ठेवत असू. त्यात मध्यभागी कमान आणि आजूबाजूला नक्षीकाम करून सुंदर सुंदर चित्रे चिकटवत असू. हे सगळे काम आम्हा मुलांचेच होते. त्या काळात 'आत्मनिर्भरता' असला बोजड शब्द कोणी वापरत नव्हते, पण आम्ही ही सगळी सजावट स्वतःच करत होतो. त्यासाठी सोनेरी कागद सोडून इतर काहीही बाजारातून न आणता घरातल्याच वस्तू वापरून ही सजावट केली जात होती.  पुढच्या वर्षीच्या मखरात लावण्यासाठी म्हणून आम्ही वर्षभर चित्रे गोळा करून ठेवत होतो आणि त्यातली चित्रे निवडून ती चिकटवणे, कमान, कमळे आणि नक्षी वगैरे काढणे, सुबक अक्षरात 'श्रीगणेशायनमः' लिहिणे वगैरे कामे गणेशचतुर्थी जवळ आल्यावर करत होतो.

 

गणेशोत्सवाच्या आठवणी - ३

गणेशचतुर्थीचा दिवस उजाडायच्या आधीच पहाटे उठून आम्ही कामाला लागत होतो. पाण्याच्या हंड्याखालचे चुलखंड पेटवून पाणी तापायला ठेवायचे, दारासमोर सडा घालून सुबक रांगोळी काढायची, आंब्याच्या पानांचे तोरण तयार करून ते दाराला बांधायचे, गच्चीवरच्या बागेतली फुले तोडून आणायची, एकवीस एकवीस दुर्वांच्या जुड्या बनवायच्या वगैरे वगैरे किती कामे असायची. आंघोळी करून झाल्यावर ठेवणीतले त्यातल्या त्यात बरे कपडे आणि डोक्यावर टोपी घालून आणि कपाळावर कुंकवाचा उभा पट्टा लावून सगळे तयार झाले की टाळ, झांजा, चिपळ्या वगैरे जे मिळेल ते वाद्य आणि एक मोठे ताट घेऊन दत्तोबाकडे जायचे आणि आमच्या नावाने ठेवलेली गणपतीबाप्पाची मूर्ती त्याचा जयजकार करत आणि वाजत गाजत घरी आणून ठेवायची.   

मग एकजण मुकटा नेसून पूजा करण्यासाठी तयार होऊन बसायचा. पळी, फुलपात्र, ताम्हन, समई,  फुलांचे हार, पूजेचे तबक वगैरे सगळी तयारी करून आणि पाट मांडून नारायणभटजींची वाट पहात बसायचे. ते आले की एकही क्षण गप्पा मारण्यात न दवडता पूजाविधी सुरू करायचे. त्या दिवशी त्यांना अनेक घरी जायचे असल्यामुळे वाया घालवायला मोकळा वेळच नसायचा. मंत्रोच्चारासहित गणपतीबाप्पांची साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा करून आरत्या, मंत्रपुष्पांजली वगैरे म्हणून झाले की मग दुपारच्या जेवणातल्या उकडीच्या मोदकांची आतुरतेने वाट पहायची.


गणेशोत्सवाच्या आठवणी - ४


घरातल्या गणपतीची प्रतिष्ठापना झाली की आम्ही आमच्या हायस्कूलकडे पळत होतो. हे परशुरामभाऊ हायस्कूल जमखंडीच्या संस्थानिकांनी जनतेच्या कल्याणासाठी बांधून शिक्षणाची उत्कृष्ट सोय केली होती. आम्हा विद्यार्थ्यांना सर्वथा अभिमान वाटावा अशीच ही शाळा होती. पूर्वी त्याचे व्यवस्थापनही संस्थानचे सरकारच करत असे. जमखंडीचे संस्थानिक पटवर्धन हे गणपतीचे भक्त असल्यामुळे त्यांच्या काळात तिथला गणेशोत्सव चांगला दणक्यात साजरा होत असेल. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर संस्थान त्यात विलीन झाले आणि आमचे हायस्कूल राज्य सरकारची शाळा झाली. तरी आमचे मुख्याध्यापक आणि वरिष्ठ शिक्षक हे 'संस्थानिकोंके जमानेके' असल्यामुळे त्यांनी जमतील तेवढ्या प्रमाणात जुन्या प्रथा सुरू ठेवल्या होत्या.    



आमच्या या शाळेच्या सुंदर इमारतीच्या मधोमध एक मोठा सेंट्रल हॉल आहे. त्या काळात त्या हॉलमध्ये आणि त्याच्या बाजूच्या प्रशस्त कॉरीडॉरमध्ये शाळेतली सगळी मुले दाटीवाटी करून उभी राहू शकायची. त्या हॉलमध्येच एका बाजूला स्टेजवर गणपतीबाप्पाची स्थापना व्हायची. समोरच्या सुंदर बागेतल्या कण्हेरी, जास्वंदी, सोनचाफा वगैरेसारख्या फुलांनी त्याला सजवले जायचे. पूजा, आरती, काही मुलांची गाणी, शिक्षकांची भाषणे वगैरे व्हायची. त्या हॉलमध्ये आवाज खूप घुमत असल्यामुळे आणि मुलांच्या गलक्यात त्यातले थोडेच समजत असेल. अखेर प्रसादाचा पेढा घेऊन तो खात खात आम्ही घरी यायचो.  

आमचा हा उत्सव अर्ध्याच दिवसाचा, किंबहुना फक्त काही तासांचाच असायचा. सगळ्या मुलांच्या आणि मास्तरांच्या घरी गणपती बसवले जात असल्यामुळे ते काम पूर्ण करून त्यांना शाळेत पोचायला साडेदहा अकरा वाजून गेले असायचे आणि संध्याकाळी सूर्य मावळायच्या वेळी शाळेच्या पटांगणाच्या कडेलाच असलेल्या 'अप्पासाहेबांच्या' विहिरीत त्या मूर्तीचे साग्रसंगीत विसर्जनही केले जात असे.  पायऱ्या आणि कमान असलेली ही विहीर चांगली  मोठ्या आकाराची होती. त्या वेळी गावातले पट्टीचे पोहणारे दोन तीन युवक मिळून पोहत पोहत त्या मूर्तीला विहिरीच्या मध्यभागी नेऊन पाण्यात डुबकी मारायचे आणि तिला अलगद तळाशी ठेऊन वर यायचे. आम्ही हे दृष्य काठावर उभे राहून आणि डोळे विस्फारून पाहून घेत होतो.


गणेशोत्सवाच्या आठवणी - ५

काही लोक गणेशचतुर्थीच्या दिवशी एकवीस गणपतींचे दर्शन घेण्याचा संकल्प करतात. लहानपणी संकल्प वगैरे शब्दच माहीत नसतात. आम्ही तर पहाटे उठल्यापासून आधी घरातला गणपती आणि नंतर शाळेतला गणपती बसवण्याच्या कामात गुंतलेले असायचे. दुपारी मोदकाचे जेवण केल्यावर थोडी सुस्तीही यायची. संध्याकाळी पुन्हा शाळेतल्या गणपतीचे विसर्जन आणि रात्री घरातल्या आरतीसाठी लवकर घरी पोचायचे असे. त्यामुळे गावभर फिरायला वेळच कुठे होता? शिवाय जिथे जाऊ तिथल्या काकू हातावर मोदक ठेवणार. एका दिवसात खाऊन खाऊन असे किती मोदक खायचे? तरीही जे जवळचे नातेवाईक होते आणि त्यांच्या घरी आमचे नेहमी जाणेयेणे होत असे अशा काकामामांकडे जाऊन त्यांच्याकडल्या गणपतींचे दर्शन घेऊन येत होतो. पुढच्या दोन तीन दिवसात गावातले सगळे सार्वजनिक गणपती पाहून आणि सगळ्या मित्रांच्या घरी जाऊन एकवीसचा कोटा सहज पूर्ण होत असे.  तसेच ठिकठिकाणी केलेली सजावटही पहायला मिळत असे. माझ्या आठवणीत तरी त्या वेळी करमणुकीचे जाहीर कार्यक्रम आमच्या गावात होत नसत किंवा कदाचित रात्रीच्या वेळी ते पहायला जायची परवानगी मुलांना मिळत नसेल म्हणून त्यातले काहीच आठवत नाही.

आमच्या घरी रोजच संध्याकाळी मुलांनी शुभंकरोति, परवचे आणि रामरक्षा म्हणून झाल्यावर धुपारती करायची प्रथा होती. त्यात सुखकर्त दुखहर्ता आणि दुर्गे दुर्घट भारी या आरत्या रोज म्हणायच्या आणि सोमवारी शंकराची, गुरुवारी दत्ताची आणि शनिवारी हनुमंताची अशा आरत्या म्हंटल्या जात. त्यामुळे त्या तोंडपाठ झाल्या होत्या. गणेशोत्सवात रोज सर्वांनी मिळून या सगळ्या आरत्या तर म्हणायच्याच, शिवाय पुस्तकात पाहून आणखी काही नवनव्या आरत्या चढाओढीने म्हणायचा कार्यक्रम अर्धापाऊण तास चालत असे.  


गणेशोत्सवाच्या आठवणी - ६


मी तीन वर्षे पुण्याच्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतांना शिवाजीनगर स्टेशनच्या जवळ असलेल्या त्या कॉलेजच्या वसतीगृहात रहात होतो. तिथून जंगली महाराज रोडने चालत चालत डेक्कन जिमखान्यापर्यंत जायचा आमचा नेहमीचाच छंद होता. गणेशोत्सवाच्या काळात आम्हा मित्रांचे टोळके त्या रस्त्याच्या आजूबाजूला असलेले सगळे गणपती तर पाहून घेत होतोच, कधीकधी शिवाजीनगर स्टेशनपासून ते नव्या पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरल्या मांडवातल्या देखाव्यांचे दर्शन घेत होतो. पन्नास वर्षांपूर्वीसुद्धा पुण्याचा गणेशोत्सव मुख्यतः आकर्षक आणि  मनमोहक अशा देखाव्यांसाठी प्रसिद्ध होता आणि हे सगळे अद्भुत  देखावे लक्ष्मी रोड, टिळक रोड, बाजीराव रोड या परिसरातच मांडलेले असत. एकादा सोयीचा आणि कोरडा दिवस पाहून त्या संध्याकाळी आम्ही त्या भागातही तीन चार तास फिरून येत होतो. पुण्यात जितके विविध प्रकारचे  कल्पक असे देखावे एकाच परिसरात पहायला मिळतात तसे मला तरी आणखी कुठेच दिसले नाहीत, मुंबईला तर नाहीच नाही.  तिथे एकाच मांडवातल्या गणपतीचे दर्शन मिळायला लांबच लांब रांगेत उभे रहावे लागायचे आणि त्यात दमछाक होत असे. मात्र मुंबईला जितक्या अगडबंब आकाराच्या भव्य मूर्ती पहायला मिळायच्या तशा पुण्याला नसायच्या. 

मी पुण्याला शिकत असतांना एका वर्षी गणेत्सवाच्या काळातच हिंसक दंगली झाल्या. त्यामुळे शहरभर कर्फ्यू लावला गेला होता. त्यावर्षी आम्हाला तिथला उत्सव पहायला मिळाला नाही. त्यानंतर अनेक वर्षांनी पुन्हा एकदा या वर्षी मी हा उत्सव पहायला कुठे बाहेर पडू शकत नाही आणि यंदा टी व्ही वर ही तो फारसा पहायला मिळत नाही असे झाले आहे.


गणेशोत्सवाच्या आठवणी - ७

मी नोकरीला लागल्यावर पहिली तीन चार वर्षे माझ्या मित्रांबरोबर दादरला रहात होतो. त्या काळातल्या सज्जन, सुविद्य, सुसंस्कृत, रसिक अशा सुखवस्तू मध्यमवर्गीयांचे आगर म्हणजे दादर अशी त्या भागाची ओळख होती. दादर, माहीम, शिवाजी पार्क या भागात अनेक कलाकार, साहित्यिक वगैरे मंडळींचे वास्तव्य होते.  अशा भागात रहायला मिळणे हीच कौतुकाची गोष्ट होती.  गणेशोत्सवाच्या काळात तर तिथे धमाल येत असे. ठिकठिकाणी मोकळ्या जागांमध्ये किंवा रस्त्यातच मांडव घालून श्रींची स्थापना केली जात असे आणि त्याची सुंदर आरास केली जात असे. ती पहायची मजा तर होतीच, पण माझ्या विशेष लक्षात राहिले आहेत ते काही ठिकाणी होणारे करमणुकीचे कार्यक्रम. हमरस्त्यांवर होणाऱ्या गोंगाटामुळे तिथे काही कार्यक्रम ठेवण्यात अर्थ नसायचा, पण जरा आतल्या बाजूला निवांतपणा मिळत असे. डी.एल.रोडवर अशी एक जागा होती. तिथे रात्री सगळी रहदारी बंद करून रस्त्यातच ठिय्या मारून खूप लोक बसत आणि तितकेच किंवा त्याहून जास्त लोक शांतपणे मागे उभे राहून कार्यक्रमांचा आनंद घेत असत. हिंदू कॉलनीतला सार्वजनिक गणेशात्सव एका मोकळ्या मांडव घालून जागेत होत असे, पण त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम रुइया कॉलेजजवळच्या एका लहानशा सभागृहात तिकीट लावून ठेवत असत. जितेंद्र अभिषेकी यांच्यासारखे गायक, मंगेश पाडगावकरांसारखे कवि आणि रमेश मंत्री यांच्यासारखे विनोदी लेखक अशा अनेक प्रसिद्ध लोकांना जवळून पहायची संधी मला दरवर्षी होणाऱ्या या जाहीर कार्यक्रमांमध्ये मिळाली. 

एकदा तर एका ठिकाणी चक्क माननीय बाळासाहेब ठाकरेच सन्मान्य पाहुणे म्हणून आले होते. तेंव्हा अजून शिवसेनेचा उदय झालेला नव्हता पण एक कुशल व्यंगचित्रकार आणि तडफदार लेखक -संपादक बाळ ठाकरे म्हणूनच ते लोकप्रिय झाले होते. आपल्या कुंचल्याच्या आणि लेखणीच्या जोरावर त्यांनी मार्मिक या साप्ताहिकाला अल्पावधीत यशाच्या शिखरावर नेले होते. आपल्या लहानशा पण प्रभावी भाषणाने आणि प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना चातुर्याने खणखणीत उत्तरे देऊन त्यांनी सर्वांची मने जिंकून घेतली होती. 


गणेशोत्सवाच्या आठवणी - ८


मी लग्न करून चेंबूरला घर थाटल्यानंतर गणपतीची पिटुकली मूर्ती आणून आमचा वेगळा घरचा गणेशोत्सव सुरू केला.  वन रूम किचनच्या  त्या इवल्याशा सदनिकेत टेबलावरच एक छोटासा पाट ठेऊन त्यावर गणपतीबाप्पांना विराजमान केले आणि आजूबाजूला थोडी फुले आणि दिवे यांची सजावट केली. तेंव्हा चेंबूर स्टेशनला लागूनच पाटील स्टोअर्समध्ये सर्व पूजासाहित्य मिळत असे.  त्याच दुकानात गणेशोत्सवामध्ये गणपतीच्या सुबक मूर्ती मिळत असत. तिथे पेणच्या खास मूर्तीसुद्धा येत असत. आयत्या वेळी आपल्याला हवी तशी मनाजोगती मूर्ती मिळेल न मिळेल म्हणून आम्ही आधीच जाऊन मूर्ती घेऊन येत असू. काही वर्षांनी त्यांनी अग्रिम आरक्षणाची सोय केली. मग आम्ही ते कधी सुरू होते याची वाट पाहून शक्य तितक्या आधी जाऊन गर्दी नसतांना निवांतपणे गणपतीच्या मूर्ती पाहून त्यातली निवड करून तिला रिझर्व करून ठेवायला लागलो. आम्ही अणुशक्तीनगरला रहायला गेलो तरी पुढील तीस वर्षेसुद्धा आम्ही दरवर्षी चेंबूरच्या पाटील स्टोअर्समधूनच गणपती आणत असू. सजावटीची व्याप्ती आणि आकारमान मात्र कालानुसार बदलत आणि वाढत गेले. आधी साध्या पुठ्ठ्याच्या कमानीचे मखर, त्यानंतर चौकोनी देऊळ, त्यावर कळस, झोपाळा, रथ, देखावा अशी प्रगती होत गेली. मधली काही वर्षे पुठ्ठ्याच्या जागी सर्रास थर्मोकोल आले आणि पर्यावरणाचा मुद्दा पुढे आल्यानंतर त्याचा वापर बंद केला गेला.


गणेशोत्सवाच्या आठवणी - ९

आम्ही लहानपणी बैलपोळ्याच्या दिवशी चिकणमातीचे छोटे छोटे बैल तयार करत होतो.  ते करतांना त्याच मळलेल्या चिकणमातीतून गणपतीचे आकारही बनवत होतो. आता "करायला गेला गणपती आणि झाला मारुती" असेही होत असे, निदान दुसऱ्या मुलांनी केलेल्या आकारांना तसे चिडवले जात असे. पण हे गणपती कधीच सुकवून घरात ठेवले मात्र जात नसत कारण ते सुकेपर्यंत त्यांना तडे जायचीच शक्यता असायची. त्यामुळे ते तात्पुरते आकार संध्याकाळपर्यंत पुन्हा बागेतल्या कुंड्यांमधल्या मातीत विलीन होऊन जात असत. दत्तोबा तांबट मात्र शाडू मातीपासून गणपतीच्या मूर्ती तयार करायच्या. ही खास प्रकारची माती तो कुठून आणत होता असा प्रश्न त्या काळात मला कधी विचारावासा वाटला नाही. पण त्या मातीचा गुणधर्म असेल किंवा त्याने त्यात मिसळलेल्या रसायनांचा असेल, ते गणपती मात्र अभंग रहात असत. बाजारातून आणलेले पेणचे गणपतीही असेच टिकाऊ असायचे.


आमच्या लहानपणी मी 'प्लॅस्टर ऑफ पॅरिस' हा शब्दसुद्धा ऐकला नव्हता किंवा हा पदार्थ डोळ्याने पाहिला नव्हता. ही एक पांढऱ्या रंगाची भुकटी असते हा शोध मला मुंबईला आल्यानंतर लागला. आधी जेंव्हा त्याचे निरनिराळे उपयोग पाहिले तेंव्हा तर तो एक अद्भुत पदार्थ वाटायचा. कदाचित त्या पदार्थाचे गणपतीसुद्धा मी अनेक वेळा कळत नकळत आणलेही असतील. पण काही वर्षांपूर्वी पर्यावरणस्नेह्यांनी पीओपीच्या विरुद्ध प्रचाराची मोठी मोहीम सुरू केली. त्यानंतर मी सखोल चौकशी करून मृत्तिकेच्या मूर्ती आणायला लागलो. या वर्षी तर कुठेही बाजारात जायची सोयही नव्हती. आमच्या बिल्डिंगमध्येच असलेल्या दुकानात थोडे तांबड्या मातीचे गणपती ठेवले होते. ते पूर्णपणे पाण्यात विरघळण्याच्या गॅरंटी होती इतकेच नव्हे तर त्यासाठी एक रिकामी कुंडी, तुळशीच्या बिया आणि जास्तीची माती देऊन त्या कुंडीत  तुळशीची रोपे लावण्याची व्यवस्था करून दिली होती. असा सगळा विचार करणे हेच धन्य आहे. ते करणाऱ्याचे कौतुक करायला हवे म्हणून आम्ही या वर्षी त्या प्रकारचा गणपती आणला.


गणेशोत्सवाच्या आठवणी - १०


माझ्या लहानपासूनच्या गणेशोत्सवाच्या आठवणी सांगता सांगता आज अनंतचतुर्दशीचा म्हणजे या उत्सवाचा शेवटचा दिवसही आला. मी दादरला रहात असतांना तिथेच समुद्रकिनाऱ्यावर अनेक गणेशमूर्तींचे विसर्जन होत असे. आम्ही दर वर्षी शक्य तितका वेळ किनाऱ्याच्या आसपास हिंडून निरनिराळ्या मिरवणुका आणि गणपतीच्या सजवलेल्या मूर्ती पाहून घेत होतो. पण मुंबईतल्या लालबागच्या राजासह अनेक मोठमोठे राजे महाराजे असलेल्या सगळ्या महत्वाच्या गणपतीबाप्पांचे विसर्जन गिरगाव चौपाटीवरच केले जात आले आहे. आमच्या चेंबूरचे आरकेस्टूडिओ आणि ड्यूक्स यांचे प्रसिद्ध गणपतीसुद्धा विसर्जनासाठी चौपाटीलाच नेत असत.  तिथे होणारी तुफान गर्दी पाहता आणि परत घरी कसे यायचे या विवंचनेमुळे मी चौपाटीला मात्र प्रत्यक्षात कधी गेलो नाही. नंतरच्या काळात  तिथली दृष्ये रसभरीत धावत्या वृत्तांतासह  टेलिव्हिजनवर पहायला मिळायला लागली. त्यामुळे आपण फारसे काही चुकवले असेही वाटले नाही. 

 पहिली अनेक वर्षे माझे ऑफिस दक्षिण मुंबईत होते. अनंतचतुर्दशीच्या दिवशी मीटिंग किंवा व्हिजिटसाठी बाहेर कुठेही जाण्याचा प्रश्नच नसायचा, आमच्या ऑफिसातही त्या दिवशी महत्वाच्या बैठका ठेवल्या जात नसत. रस्त्यावरील तुडुंब वाहणारी गर्दी, त्यामुळे होणारी वाहतुकीची प्रचंड कोंडी वगैरेंचा विचार करून आम्हाला ऑफीसातून दोन तीन तास आधीच सुटी मिळत असे. लग्न व्हायच्या आधी आम्ही तीनचार मित्र मिळून इकडे तिकडे हिंडत असू आणि ठिकठिकाणाहून चौपाटीकडे जायला निघालेल्या मिरवणुका पहात असू. संसार थाटल्यानंतर आधी सरळ घरी येऊन सहकुटुंब  एकादी लहानशी चक्कर मारून यायला लागलो.  लहानमोठे असंख्य गणपती आणि त्यांचे देखावे वगैरेंमधून बाप्पाची कोटीकोटी रूपे त्या काळात मला पहायला मिळाली. 

आमचा योजना प्रतिष्ठानशी संबंध आल्यानंतर दर वर्षी अनंतचतुर्दशीला एक वेगळा कार्यक्रम निश्चित झाला. परळच्या ऑव्हरब्रिजला लागूनच असलेल्या एका चाळीतल्या खोलीत या प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी अनंतचतुर्दशीच्या दिवशी संगीत भजनाचा लहानसा घरगुती पण चांगल्या दर्जाचा कार्यक्रम केला जात असे आणि त्यात स्व.शिवानंद पाटील, योजनाताई आणि त्यांचे निवडक शिष्यगण भक्तीपूर्ण गायनसेवा मनापासून सादर करीत असत. बाहेरील रस्त्यावरून जात असलेल्या मिरवणुकांमध्ये चाललेला ढोलताशांचा गजर आणि त्यांच्यावरताण आवाज काढून बंदिस्त खोलीत केलेले ते उच्चरवातले गायन यात एक वेगळा रंग येत असे. संध्याकाळच्या सुमारास घरी परत येतांना आमची बस मुंगीच्या पावलाने चालत असे आणि आम्हाला उलट दिशेने समुद्राकडे जाणारे खूप गणपती पहायला मिळत असत.   त्यासाठी आम्ही मुद्दाम डबलडेकर बस घेऊन वरच्या मजल्यावर चढून बसत होतो.

आज या वर्षीच्या गणेशोत्सवाबरोबर या लघुलेखमालिकेची सांगता होत आहे. गणपतीबाप्पा मोरया । मंगलमूर्ती मोरया ।