Thursday, February 24, 2011

संस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे - ४

आदिमानवापासून आतापर्यंत माणसाचा कसा विकास होत गेला हे सांगणारे पाश्चात्य विद्वानांनी तयार केलेले मानववंशशास्त्र साफ खोटे आणि दिशाभूल करणारे आहे असे आपल्याकडले कांही लोक नेहमी सांगत असतात. ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली तेंव्हाच अचाट सामर्थ्य, बुध्दीमत्ता आणि नीतीमत्ता यांनी युक्त असे महर्षी निर्माण केले आणि आपल्या चार मुखाद्वारे त्यांना चार वेद सांगितले. त्यात जगातील यच्चयावत सर्व ज्ञानाचा समावेश होता असे त्यांचे म्हणणे असते. हे ज्ञान संस्कृत भाषेमध्ये आहे आणि वैदिक वाङ्मय अपौरुषेय आहे. ते कोणा मर्त्य मानवाने लिहिले नसून साक्षात ब्रह्मदेवाने मौखिक रूपाने सांगितले आहे. अर्थातच त्यांच्या मते संस्कृत भाषेच्या बाबतीत उद्गम, विकास वगैरे टप्पे संभवत नाहीत. ब्रह्मदेवाने आपल्या देववाणीमध्ये सारे काही ज्ञान एकदम सांगितले, महर्षींना ते लगेच समजले आणि त्यांनी ते आपल्या शिष्यांना दिले. आजतागायत लागत असलेले सारे नवे शोध या महर्षींना आधीपासून अंतर्ज्ञानाने माहीत होते आणि त्यांनी संस्कृत भाषेत ते कुठेतरी लिहून ठेवलेले आहेत अशी काही लोकांची नितांत श्रध्दा असते आणि त्यावर कोणी शंका घेतलेले त्यांना खपत नाही.

संस्कृत ही भाषा संगणकप्रणालीसाठी सर्वोत्तम आहे असे प्रशस्तीपत्रक फोर्बस या जागतिक संस्थेने दिले असल्याची अफवा मध्यंतरी पसरली होती आणि तसा उल्लेख आजसुध्दा वेळोवेळी केला जात असतो. आजच्या सुपरकाँप्यूटरपेक्षा अनेकपटीने प्रभावी संगणक आपल्या पूर्वजांकडे असले पाहिजेत असा अंदाज त्यावरून व्यक्त केला जात असतो. प्रत्यक्षात मात्र संस्कृतमध्ये प्रणाली असलेला संगणक अजूनपर्यंत जागतिक बाजारपेठेत आलेला नाही. त्या कामासाठी या दिव्य भाषेचा नेमका कसा उपयोग करून घ्यावा हे त्या क्षेत्रांमधील विशारदांना अजून समजले नसावे. पण यासाठी आता अमेरिका, जर्मनी वगैरे देशातल्या शाळाकॉलेजांमध्ये संस्कृत भाषेचा कसून अभ्यास चालला आहे असेही वारंवार सांगितले जाते. निदान मला तरी माझ्या लहानशा जगप्रवासात तशी माहिती कोठे मिळाली नाही.

काही लोकांना मात्र संस्कृत भाषेच्या भविष्याबद्दल आता चिंता वाटायला लागली आहे असे दिसते. त्यांच्या मनात निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या भावनांचे दर्शन खाली दिलेल्या परिपत्रकात दिसून येते. निदान दहा बारा मित्रांकडून मला ईमेलने हा संदेश मिळाला आहे. त्यातले काही जण उच्चविद्याविभूषित तसेच परदेशभ्रमण करून आलेले सुजाण आणि संतुलित विचार करणारेसुध्दा आहेत. त्यामुळे मी ते पत्रक स्पॅममध्ये न ढकलता लक्षपूर्वक वाचून पाहिले.

"अवगत असलेल्या भाषा" मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा आणि पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा वापरतो. संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत. हि भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. कारण मागील सर्वेक्षणात संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते. उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही राज्यात अगदी ठरवूर ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत. मृत भाषा घोषित झाली की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जात नाही. आणि मग आपली ही पुरातन आणि पवित्र भाषा कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल. तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो. आज आपल्याच भाषेवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली नाही.
जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा"

हजार वर्षांचा मुसलमानी अंमल आणि दीडदोनशे वर्षांचे इंग्रजांचे राज्य या अत्यंत प्रतिकूल काळात टिकून राहिलेली प्राचीन संस्कृत भाषा आज केवळ सरकारी निधीच्या आधारावर जीवंत असावी, जनगणनेमध्ये ही भाषा अवगत असलेल्या लोकांची संख्या कमी झाली की सरकार तिला मृत घोषित करेल आणि त्यानंतर ती कायमची नष्ट होईल. वगैरे जे चित्र यात सूचित केले आहे त्यातले मला तरी काहीही तर्कसंगत वाटत नसल्यामुळे मी त्या पत्रकाचा पुढे प्रसार केला नाही. संस्कृत भाषेच्या प्रेमापेक्षा अवांतर मुद्दे उपस्थित करून राज्यकर्ते आणि काही इतर लोक यांच्याबद्दल लोकांच्या मनात अढी निर्माण करणे हा त्यामागचा उद्देश असावा असे दिसते. संस्कृत भाषा खरोखरच नष्ट होण्याची भीती ज्यांना वाटत असेल आणि तसे होऊ नये असे वाटत असेल तर त्यांनी ती स्वतः शिकावी आणि इतरांना शिकवावी. पण ते काम महाकठीण आहे. अनेक लोकांनी जनगणनेत संस्कृत ही आपल्याला अवगत असलेली भाषा आहे असे (ती नसतांना जाणूनबुजून चुकीचे) लिहिले की काम झाले असे नाही. ती भाषा शिकवणारे आणि शिकण्याची इच्छा बाळगणारी माणसे त्यासाठी असायला हवीत. ती आता झपाट्याने कमी होत चाललेली आहेत. भविष्यकाळात पुन्हा एकदा संस्कृत ही सर्वसामान्य दैनिक संभाषणाची भाषा बनण्याची शक्यता दिसत नाही. एक प्राचीन भाषा हीच तिची ओळख राहणार आहे. आज ती किती लोकांना अवगत आहे याचा त्यात कुठे संबंध येत नाही. भविष्यकाळातील लोकांना प्राचीन काळाबद्दल आस्था उरली नाही तर त्याला काही इलाज नाही. समाजाच्या ज्या वर्गामध्ये या परिपत्रकाचा प्रसार होत आहे त्यातील काही जणांची मुले परदेशात स्थाईक झाली आहेत. त्यांच्या बाबतीत ही आशंका खरी ठरण्याची भीती अधिक प्रमाणात असणार.

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

संस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे - ३

संस्कृत ही जीवंत भाषा आहे की मृत भाषा आहे असा वाद मी शाळेत असल्यापासून चालत आलेला मी ऐकला आहे आणि त्यात दोन्ही बाजूंनी भागसुध्दा घेतला आहे. घरात चाललेल्या चर्चांपासून ते वर्तमानपत्रात आणि आता आंतर्जालावर चालत असलेल्या वादविवादात हिरीरीने भाग घेणा-यांसाठी हा एक आवडता विषय आहे. त्यात दोन्ही बाजूंनी पटतील असे चांगले मुद्दे असले तरी ते वरवर राहतात आणि भाषा बाजूला राहून अवांतर छुपे उद्देश समोर येतात हे पाहिल्यानंतर मी त्यात भाग घेणे सोडून दिले आहे.

माणसे तसेच कुत्रीमांजरे किंवा कावळेचिमण्या यासारखे पशुपक्षी हे सजीव आहेत आणि दगड, माती, लाकूड वगैरे निर्जीव वस्तू आहेत हे सगळ्यांना ठाऊक असते. त्यासाठी त्यांना कोणतीही व्याख्या करावी लागत नाही. हालचाल करणारे, बोलणारे ते सजीव आणि ते न करणारे निर्जीव असे अगदी सोपे निकष मानले तर त्याला अनेक अपवाद निघतात. सजीवांचे चालणेबोलणे निद्रावस्थेत, बेशुध्दावस्थेत आणि कोमात गेल्यानंतर कमीकमी होत जाते व जवळजवळ थांबल्यात जमा होते. तरीही ते जीवंत असतात. हालचाल आणि संभाषण न करणारे वनस्पतींचे प्रचंड विश्व सचेतन असते. उलटपक्षी पाहता निर्जीव असा लोखंडाचा तुकडासुध्दा सतत स्पंदन करत असतो असे सूक्ष्म निरीक्षणातून समजते. त्याच्यावर प्रहार केला तर त्यातून ठराविक प्रकारचा नाद निर्माण होतो आणि त्याचा तुकडा मोडतांना वेगळे आवाज निघतात. तरी तो मात्र अचेतनच असतो. सजीव प्राणी श्वासोच्छ्वास करतात, त्यांचे शरीरात रक्ताभिसरण सुरू असते, ते जन्माला येतात, अन्नग्रहण करतात, काही काळ वाढतात आणि अखेर मृत्यू पावतात वगैरे त्यांचे इतर काही गुणविशेष आहेत. पण त्यांनासुध्दा अपवाद दाखवता येतील. अनेक प्रकारची स्वयंचलित यंत्रे हवेमधील प्राणवायूचे शोषण करून कर्बद्विप्राणील वायूंचे उत्सर्जन करत असतात. त्यांची संख्या आता इतकी वाढली आहे की त्यांच्यामुळे पृथ्वीवरील वातावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. त्यांनासुध्दा इंधन लागते. अनेक संयंत्रांमध्ये पाणी किंवा विशिष्ट तेलाचे सतत अभिसरण होत असते. जगातल्या एकूण एक जड आणि अचेतन वस्तूसुध्दा केंव्हातरी निर्माण झालेल्या असतात तसेच त्या नष्टसुध्दा होत असतात. फक्त त्या बाबतीतल्या प्रक्रिया निराळ्या असतात.

सजीवांमध्ये प्राण असतो आणि निर्जीवांमध्ये तो नसतो हा खरे तर त्यांच्यामधला सर्वात जास्त महत्वाचा, कदाचित एकमेव निश्चित असा फरक असतो, पण प्राण या संकल्पनेचे अस्तित्व मात्र अद्याप अगम्यच आहे. ते कशा प्रकारचे आहे हे डोळ्यांना दिसणा-या किंवा हाताने स्पर्श करता येणा-या अशा जड वस्तूंच्या उदाहरणातून दाखवता येत नाही आणि पाहताही येत नाही.

सजीव प्राण्याच्या शरीरात असतो तशा प्रकारचा प्राण भाषांमध्ये असणार नाही. वर दिलेल्या जीवंतपणाच्या इतर व्याख्या भाषांना कशा लावता येतील याचे मापदंड स्थळकाळानुसार वेगवेगळे असतात. एकादी भाषा बोलता येणे, ती वाचता येणे आणि लिहिता येणे ही एकाद्या माणसाला ती भाषा येत असल्याची ठळक लक्षणे समजली जातात. निरक्षर लोकांना ती भाषा फक्त बोलता येते, काही साक्षर लोकांना लिहिलेले वाचता येते पण स्वतः मजकूर रचून तो लिहिता येत नाही. काही लोकांना या तीनही गोष्टी करता येतात. पण त्यासाठी त्या भाषेमध्ये लिहिण्यावाचण्याची सोय असायला हवी. सुरुवातीला माणसांनी एकमेकांबरोबर संवाद साधण्याच्या प्रयत्नांमधून वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये निरनिराळ्या भाषांचा जन्म झाला. आदिम काळात त्यांचा उपयोग फक्त बोलण्यात होत असणार. आजही दुर्गम अशा रानावनात राहणारे निरक्षर वनवासी, आदिवासी, ट्रायबल वगैरे लोक आपापसात त्यांच्या बोलीमधून बोलत असतात. त्यांच्या दृष्टीने पाहता त्या त्यांच्या भाषाच असतात आणि रोजच्या वापरात असल्यामुळे त्यांना जीवंतच म्हणायला हवे. पण त्यांना अधिकृत भाषा म्हणून सुशिक्षित लोकांच्या जगात मान्यता प्राप्त झाली नसेल, कदाचित त्या भाषेला विशिष्ट नावसुध्दा नसण्याची शक्यता आहे.

प्राचीन काळापासून जगाच्या निरनिराळ्या भागात काही प्रगत अशा संस्कृती उदयाला आल्या, कालांतराने त्यातल्या काही अस्तालासुध्दा गेल्या. बहुतेक ठिकाणी संस्कृतीच्या सोबतीने लेखनकलेचा उदय आणि विकास होत गेला. तो होत असतांना त्या लोकांच्या वापरात असलेल्या भाषांचे व्याकरण तयार झाले, त्यांच्यासाठी लिपी तयार होत गेली आणि त्यात लिखित वाङ्मयाची, ग्रंथांची निर्मिती होत गेली. त्या भाषांचे शास्त्रोक्त शिक्षण घेण्याची व देण्याची व्यवस्था झाली. मानवांच्या जीनवात त्यांना अधिकाधिक महत्वाचे स्थान प्राप्त होत गेले. त्या भाषांच्या सहाय्याने मानवाने अनेक विषयांचा अभ्यास केला आणि त्यातून त्याची प्रगती होत गेली. अशा प्रकारे ज्या बोलीभाषा अक्षरांमध्ये लिहिल्या व वाचल्या जात त्यांना प्रतिष्ठा, लोकप्रियता आणि राजमान्यता मिळत गेली.

प्राचीन काळात, बहुधा हजारो वर्षांपूर्वीच्या काळातल्या सर्वात जास्त प्रगत विश्वात संस्कृत या भाषेला सर्वमान्यता व मोठी प्रतिष्ठा मिळाली होती. त्या भाषेत लिहिल्या गेलेल्या अप्रतिम साहित्यकृती अजरामर होऊन राहिल्या. संस्कृत भाषासुध्दा प्रदीर्घ काळापर्यंत आर्य लोकांची बोलीभाषा राहिली असावी. कालांतराने वेगवेगळ्या भागांमध्ये तिच्या स्वरूपात स्थानिक बदल होत गेले, शब्दांचे अपभ्रंश होऊन नवे शब्द तयार होऊन ते रूढ झाले. परकीय भाषांमधील काही शब्दांचा उपयोग होऊ लागला आणि त्यातून मराठी, हिंदी, बांगला आदि आजच्या भाषा आणि त्यातील प्रत्येकीच्या अनेक उपभाषा तयार होत गेल्या. तरीदेखील भारतातील विद्वान लोकांना संस्कृत भाषा शिकून त्या भाषेमधील ज्ञानाचे संपादन करण्याची आणि साहित्याचा आस्वाद घेण्याची इच्छा होत राहिली, आयुर्वेद, ज्योतीर्विद्या आणि मुख्य म्हणजे हिंदू धर्म यांचे अध्ययन करण्यासाठी संस्कृत भाषा शिकून आत्मसात करणे अत्यावश्यक होते. या कारणांमुळे ती भाषा रोजच्या संभाषणामध्ये वापरली जात नसतांनासुध्दा तिचे अध्ययन आणि अध्यापन चालत राहिले. हजारो वर्षे हे काम गुरूशिष्यपरंपरेतून होत राहिले. इंग्रजांचे राज्य आल्यानंतर त्यांनी सुरू केलेल्या शाळांमधील शिक्षणातदेखील संस्कृतचा अंतर्भाव करण्यात आला. आधीच्या लेखात मी लिहिले होते त्याप्रमाणे आधुनिक काळातल्या भारतीय भाषांवर संस्कृतचा इतका मोठा प्रभाव आहे की त्यांचा अभ्यास करतांनासुध्दा संस्कृत भाषेची थोडी ओळख असणे आवश्यक असते.

. . . . . . . . . . . (क्रमशः)

Saturday, February 19, 2011

संस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे - २

आपल्याला जे काही थोडे फार येत असेल त्याचा उपयोग करून घेण्याकडे माझा पहिल्यापासून कल असायचा. तो प्रयत्न करतांना आणखी काही वेगळे शिकायची गरज पडत असे, ते शिकण्याची संधी मिळत असे आणि मी तिचा लाभ घेत गेलो. केवळ पोपटपंची करण्यासाठी घोकंपट्टी करणे मला पसंत नव्हते. शिकलेले विषय समजून घेऊन लक्षात ठेवणे आणि त्यांचा जमेल तसा उपयोग करणे यावर माझा भर होता. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करू लागल्यानंतर तर रोजच नवनव्या तांत्रिक गोष्टी नजरेसमोर येत असत आणि त्या आत्मसात करणे आवश्यक असल्यामुळे कामाशिवाय अवांतर पाठांतर करायला वाव उरला नाही आणि संस्कृत भाषेचे अध्ययन थांबले. मी रहात असलेल्या कोणत्याच भागात संस्कृत ही भाषा बोलली जात नव्हती.

घरात किंवा एकाद्या देवळात चाललेली पूजा अर्चा पाहतांना त्यावेळी म्हंटले जात असलेले संस्कृत मंत्र कानावर पडायचे. संस्कृतचा थोडा अभ्यास केल्यानंतरच्य़ा काळात त्या मंत्रांचा उच्चार स्पष्ट ऐकू आला तर त्यातली सोपी वाक्ये समजायला लागली. वाढत्या वयानुसार केलेल्या अवांतर वाचनातून नव्या विचारांची शिंगे फुटायला लागली होती. "आपल्याला अमूक मिळावे यासाठी आपण तमूक विधी करणार आहोत" असा संकल्प त्या सर्वव्यापी सर्वज्ञ परमेश्वराला सांगायचा आणि सर्व जगाच्या कर्त्याकरवत्याकडे "मी तुझ्यासाठी हे करतो आहे, तेंव्हा तू माझ्यासाठी एवढे कर" अशी प्रार्थना करायची, त्यानंतर "आता मी त्या देवाला स्नान घालतो", "त्याला चंदन लावतो", "फुले वाहतो", नैवेद्य देतो", "दिवा दाखवतो", "धूपाचा सुवास देतो", "त्याचे ध्यान करतो" वगैरे गोष्टी त्याला सांगून करायच्या हे जरासे विसंगत वाटू लागले. परमेश्वराबरोबर करण्याचे हे सगळे संभाषण संस्कृत भाषेतच कशाला करायला हवे असा प्रश्न पडू लागला. मोठेपणी मी या पारंपारिक धर्म किंवा कर्ममार्गाने फारशी वाटचाल केली नाही. अशा प्रकारे माझ्या रोजच्या जीवनात संवाद, लेखन, वाचन यातल्या कुठल्याच मार्गाने संस्कृत भाषेचा उपयोग केला जात नव्हता.

एका परीने मी संस्कृत भाषेकडे अशी पाठ फिरवली असली तरी ती मात्र माझ्या पाठीशी अगदी मला खेटून उभी आहे असे गेली पन्नास वर्षे मला नेहमी जाणवत राहिले आहे. किंबहुना मी तिच्यापासून कधीच दूर गेलो नव्हतो. घरात आणि नातेवाइकांशी होणारे सर्व बोलणे मातृभाषेत होते आणि बाहेरच्या जगाशी होत असलेला संपर्क मुख्यःत्वे राष्ट्रभाषेत होतो. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांची जननी असलेल्या संस्कृत भाषेमधील असंख्य शब्दप्रयोग त्यात सारखे येतच असतात. आजीच्या घरात आपण रहात नसलो तरी तिच्याबद्दल अतीव आपुलकी वाटते, तिच्या आठवणी, तिचे संदर्भ नेहमी निघतच असतात. असेच काहीसे हे आहे. शिवाय या समानतेमुळे यातली एक भाषा चांगली येत असेल तर दुसरी भाषा समजण्याला त्याची खूप मदत होते.

याशिवाय संस्कृत भाषेचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे नवे शब्द निर्माण करण्याचे तिचे सामर्थ्य. माझ्या लहानपणाच्या काळानंतर गेल्या पन्नास वर्षात विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली, रहाणीमानात मोठे बदल झाले, कुटुंबसंस्था, सामाजिक वातावरण, राजकीय परिस्थिती वगैरेंमध्ये बदल झाले. त्यांच्यासोबतीने अनेक नवे शब्दप्रयोग आले. काँप्यूटर, इंटरनेट, व्हायरस यासारख्या नव्या शब्दांसाठी संगणक, आंतर्जाल, विषाणू यासारखे प्रतिशब्द तयार झाले. मराठी आणि हिंदीमधून राज्यकारभार करणे सुरू झाल्यानंतर आयुक्त, उपमहानिरीक्षक, कार्यकारी अभियंता वगैरे नावांची पदे निर्माण झाली. असले बहुतेक सगळे नवे शब्द संस्कृतजन्य आहेत. ज्या काळात संस्कृत ही भाषा बोलली जात होती त्या युगात या शब्दांची गरज नव्हती. त्यामुळे प्राचीन वाङ्मयात हे शब्द दिसणार नाहीत. संस्कृत भाषेच्या मूळ शब्दकोशांमध्ये ते सापडणार नाहीत. पण मराठी, हिंदी या सारख्या संस्कृतजन्य भाषांमध्ये असे नवे शब्द निर्माण करण्यासाठी आणि प्रचलित करण्यासाठी त्या प्राचीन भाषेचा उपयोग केला गेला आणि केला जात आहे. मुलगी मोठी होऊन सासरी नांदायला गेल्यानंतरसुध्दा तिची आई तिला अधून मधून काहीबाही देतच असते आणि गरज पडल्यावर मुलगी आपल्या आईकडे आधारासाठी पाहतेच ना? भारतीय भाषांच्या बाबतीत ही गोष्ट जास्त मोठ्या प्रमाणात होतांना दिसते. सर्वांना मान्य होतील असे नवे शब्द तयार करतांना बहुतेक वेळी संस्कृत भाषेवचाच आधार घेतला जातो.

सिंधूदुर्गपासून गोंदियापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रात बोलल्या जाणा-या बोलीभाषांमध्ये निरनिराळ्या स्थानिक शब्दांचा वापर होत असतो. एका भागातले खास शब्द बरेच वेळा दुस-या भागातील लोकांना अपरिचित असतात. हिंदी भाषा बोलणा-या प्रदेशाचा विस्तार तर खूपच मोठा आहे. शिवाय वैराण वाळवंट, घनदाट वनराई, उत्तुंग हिमशिखरे आणि समतल भूमी असे विविध प्रकारचे भौगोलिक प्रदेश त्यात येतात. अर्थातच त्या भागांमध्ये बोलल्या जाणा-या बोलींमध्ये जास्त वैविध्य आहे. पण दोन्ही भाषांच्या बाबतीत असे दिसते की देशातच नव्हे तर आता जगभर पसरलेल्या सुशिक्षित लोकांना समजतील अशा ज्या प्रमाणभाषा तयार केल्या गेल्या आहेत, शासकीय व्यवस्थेमध्ये ज्यांचा उपयोग केला जात आहे, मुद्रणतंत्रज्ञानाचा विकास झाल्यानंतर ज्या प्रमाणभाषांमध्ये अधिकाधिक लेखन केले जात आहे. त्या अधिकृत भाषांवर असलेला संस्कृतचा प्रभाव जाणवल्याशिवाय रहात नाही.

मी लहानपणी शिकलेले संस्कृत भाषेचे व्याकरण आतापर्यंत विसरून गेलो आहे. त्या भाषेत मला कदाचित आज एकादेही व्याकरणशुध्द वाक्य लिहिता येणार नाही. बोलण्याचा तर प्रयत्नसुध्दा मी कधीच केला नव्हता. पण या लेखातल्या वाक्यावाक्यांमध्ये संस्कृत भाषेमधून घेतलेल्या शब्दांची रेलचेल केलेली आणि ती मराठीमध्ये सहज खपून गेलेली दिसेल.

. . . . . . . . . . . (क्रमशः)

Tuesday, February 15, 2011

संस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे - १

माझ्या लहानपणापर्यंत सुलभपणे मराठी भाषेची लिपी शिकण्यासाठी 'गमभन'चा शोध लागला नव्हता. सगळ्या चांगल्या कामांची सुरुवात 'श्रीगणेशा'ने होत असे. 'श्रीगणेशा' म्हणजेच 'शुभारंभ' असा मुळी एक वाक्प्रचारच आहे. त्याप्रमाणे लेखन व वाचनाच्या शिक्षणाची सुरुवातसुध्दा 'श्रीगणेशायनमः' या वाक्याने होत असे. त्याचा उच्चार तेंव्हा श्रीगणेशायन्महा असा व्हायचा. श्रीश्री, गग करत एक एक करून सावकाशपणे श्री ग णे शा य न मः ही सारी अक्षरे शिकून झाल्यानंतर अआइई, कखगघ वगैरे मुळाक्षरे शिकायला मिळाली. पण अक्षरज्ञान होण्याच्याही आधीच रोज संध्याकाळी 'शुभंकरोती' म्हणायची संवय मला लावली गेली होती. घरातली सगळी मुले, म्हणजे माझी मोठी भावंडे तीन्ही सांजा होऊन गेल्यावर एकत्र बसून 'शुभंकरोती कल्याणम्', 'वक्रतुंड महाकाय', 'गणनाथ सरस्वती' वगैरे श्लोक म्हणायचे. ते रोज ऐकून मला तोंडपाठ झाले होते आणि मी सुध्दा रोज त्या सामूहिक पठणात सामील होत असे. अशा प्रकारे मला कळायला लागण्याच्या आधीच संस्कृत भाषेची थोडीशी ओळख झाली होती. फक्त त्याला 'संस्कृत' म्हणतात हे ठाऊक नव्हते. हे सगळे म्हणजे 'देवबाप्पाची प्रार्थना' आहे, मुलांनी रोज ती करायची असते आणि ती केल्यामुळे तो बाप्पा आपल्याला 'चांगली बुध्दी' देतो आणिकही आपले सगळे काही चांगले करतो असे एक कारण त्यासाठी दिले जात असे आणि बालमनाला त्याचीही गरज नव्हती. आई सांगेल ते ऐकायचे एवढेच कारण पुरेसे होते.

संस्कृतातले हे श्लोक म्हणायला येऊ लागल्यानंतर वाढत्या वयानुसार त्यात रामरक्षा, गणपतीअथर्वशीर्ष वगैरेंची भर पडत गेली. 'ध्यायेदाजानुभावम् धृतशरधनुष्यम् बध्दपद्मासनस्थम्' अशासारखे जोडाक्षरांनी युक्त शब्दसमूह एका दमात आणि चालीवर म्हणण्यामुळे जीभ लवचीक होते, नाहीतर ती जड होते, तसेच अशा पठणातून छातीला व्यायाम मिळतो वगैरे त्यापासून असलेले इतर फायदेही सांगत असत. शिवाय त्या काळात अंधा-या रात्री हे श्लोक म्हणजे भुताखेतांपासून आपले संरक्षण करण्याचे प्रमुख साधन होते. लहान गावात विजेचा प्रसार फारसा न झाल्यामुळे रस्त्यात नेहमी अंधारगुडुप असायचाच, घरातसुध्दा अनेक वेळा अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे भुते, हडळी, पिशाच, समंध वगैरेंना मनसोक्तपणे हिंडायला मोकळे रान मिळत होते आणि कोणाकोणाला कसला कसला भास झाल्याच्या सुरस कथा नेहमी ऐकायला मिळत असत. त्यामुळे अशा श्लोकांपासून मनाला मोठा आत्मविश्वास मिळत असे.

तोंडपाठ केलेल्या श्लोकांचा किंवा मंत्रांचा अर्थ समजावून द्यावा किंवा तो समजून घ्यावा असे सहसा कोणालाही वाटायचे नाही. लिहिलेली अक्षरे आणि त्यांचे पठण करतांना होणारा नाद एवढ्याच गोष्टी अत्यंत महत्वाच्या असत. त्यात तसूभरही अंतर पडलेले चालत नव्हते. आपल्या महान पूर्वजांनी लिहून ठेवलेले हे सारे श्लोक आणि मंत्र सामर्थ्यवान आणि अचूकच असले पाहिजेत आणि ते जसेच्या तसे पुढील पिढीला देणे हे आपले परमकर्तव्य आहे अशीच सर्वसाधारण धारणा असायची. त्याबद्दल कोणताही प्रश्न विचारायची मुभा नसायची. शंका घेणे हा तर सर्वस्वी अक्षम्य गुन्हा होता. एका दृष्टीने ते ही ठीकच होते. एकाद्या आडदांड थोराड मुलाला 'अरे ढबाल्या' किंवा 'वाकडतोंड्या' असे म्हंटले तर तो आपले थोबाड नक्की फोडणार एवढी अक्कल मुलांना त्यांच्या अनुभवातून येत होती. पण गणपतीबाप्पाला मात्र 'वक्रतुंड, महाकाय' ही विशेषणे लावली तरी तो कसा रागावत नाही? असा प्रश्न त्या शब्दांचा अर्थ समजल्यास त्यांना पडला असता. कोटी या प्रचंड संख्येचा त्यांना अंदाज नसला तरी त्या बाप्पाचा एका सूर्याएवढा प्रकाशसुध्दा आपल्याला कसा दिसत नाही?, उलट आपल्यालाच त्याच्यासमोर दिवा का लावावा लागतो? असल्या अधार्मिक शंका लहान मुलांच्या मनात उठल्या असत्या. त्यापेक्षा त्यांना तो अर्थ न समजलेलेच बरे होते.

शाळेत मराठी भाषेचे व्याकरण शिकतांना 'तत्सम', 'तद्भव', 'संस्कृतजन्य' आदि शब्दांसह जसजशी अशा शब्दांची ओळख होत गेली, तसतसशी संस्कृत भाषेच्या ज्ञानात भर पडत गेली, आठवीपासून अकरावीपर्यंत संस्कृत या विषयाचाच अभ्यास केला. त्यासाठी 'रामः रामो रामाः' पासून पाठांतराला एकदा जी सुरुवात झाली त्यानंतर चार वर्षे पाठांतरे होतच राहिली. अकार, आकार, इकार, उकार वगैरें निरनिराळ्या 'कारां'नी अंत असलेले पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी शब्द आणि त्यांची एकवचन, द्विवचन व बहुवचनातील प्रथमा, द्वितिया आदि आठ विभक्त्यांमधली सगळी रूपे पाठ करावी लागत होती. त्याचप्रमाणे सर्वनामे, विशेषणे, क्रियाविशेषणे यांची वेगवेगळी रूपे आणि अनेक प्रकारच्या क्रियापदांची विविध काळामधली विविधवचनी रूपे अशा असंख्य गोष्टींचे पाठांतर करणे आवश्यक होते. पण रोजच्या जीवनात त्यांचा उपयोग नसल्यामुळे त्यांचे विस्मरण व्हायलाही वेळ लागत नसे.

सोपे शब्द असलेल्या काही वाक्यांमधून एकादी गोष्ट सांगणारे किंवा बोध देणारे गद्य धडेसुध्दा संस्कृतच्या पुस्तकात असायचे आणि व्यास, वाल्मिकी यांच्यापासून ते कालिदास, भवभूती यांच्यापर्यंतच्या महाकवींच्या रचनांची किंचित झलक दाखवणारे पद्याचे उतारेही असत. त्यातल्या एकाद्या परिच्छेदाचे किंवा श्लोकाचे मराठी भाषांतर करायचे प्रश्न पेपरात असायचे, त्यामुळे त्याचेही पाठांतर केले जात असे. तसेच गाळलेल्या जागा भरा, जोड्या जमवा, वाक्य पूर्ण करा असे पैकीच्या पैकी मार्क देणारे अनेक प्रश्न पेपरात असल्यामुळे संस्कृत हा गणितासारखा स्कोअरिंग विषय होता. मात्र गणित हा विषय पायरी पायरीने चढता चढता अधिकाधिक पक्का होत गेला तसा संस्कृत हा विषय झाला नाही. शाळेबरोबरच संस्कृतशी असलेला संबंध सुटला तो जवळ जवळ कायमचा.

. . . . . . . . (क्रमशः)

Friday, February 11, 2011

काय खरं आणि काय खोटं ते देव जाणे

आपल्या डोळ्यावर माणसाचा प्रचंड विश्वास असतो. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या घटनेचे आपल्याला पूर्ण आकलन झाले आहे असे त्याला वाटते आणि ते बव्हंशी बरोबर असते. ऐकीव गोष्टींची खातरजमा डोळ्यांनी पाहून केली जाते. 'आय विटनेस' किंवा 'प्रत्यक्षदर्शी' साक्षीदाराच्या सांगण्याला न्यायालयात महत्व दिले जाते. "चक्षुर्वै सत्यम्" असा संस्कृतमध्ये वाक्प्रचारसुध्दा आहे. आपल्या पाच ज्ञानेंद्रियांपैकी डोळा हे सर्वाधिक महत्वाचे आहे आणि आपल्याला क्षणोक्षणी मिळत असलेल्या माहिती आणि ज्ञानाचा अर्ध्याहून जास्त भाग दृष्टी या माध्यमामधून मिळतो असे म्हणतात.

वाचनाची क्रिया डोळ्याकडून होत असल्यामुळेच कदाचित लिखित माहितीला खूप महत्व दिले जाते. हस्तलिखित लिखाणापेक्षाही छापलेल्या मजकुरावर लोकांचा जरा जास्तच भरवसा असतो. त्यातले अक्षर अन् अक्षर खरेच असणार असे कित्येक लोकांना वाटते. कथा, कादंब-या आदि ललित वाङ्मय काल्पनिक असते हे सुजाण वाचकांना ठाऊक असते. तरीसुध्दा ऐतिहासिक कादंब-यांनाच इतिहास समजणारी माणसे मी पाहिली आहेत. पौराणिक वाङ्मयाबद्दल तर विचारायलाच नको. पोथ्यापुराणात वर्णिलेल्या अशक्य घटनासुध्दा पुराणकालात नक्कीच प्रत्यक्षात घडून गेल्या असल्याचा दावा शहाणी सुरती सुशिक्षित माणसे सुध्दा करतांना दिसतात.

पण 'दिसतं तसं नसतं' असा अनुभव कधी कधी येतो. 'तसं असतं म्हणून जग फसतं' हे देखील जाणवते. सिनेमा आणि टीव्हीवर दाखवण्यात येणाच्या कार्यक्रमांच्या सुरुवातीलाच "ही कथा आणि यातली सर्व पात्रे काल्पनिक आहेत" असा खुलासा केलेला असतो. तरीसुध्दा तो 'वास्तववादी' असावा अशी अपेक्षा असते आणि त्या बनावटी कथानकात तात्पुरत्या काळासाठी सहभागी होऊन त्यामधील पात्रांसोबत प्रेक्षकसुध्दा हंसतो, रडतो, बावरतो किंवा आक्रोश करतो. हे सगळे खोटे आहे याचे भान तो विसरतो.

या पार्श्वभूमीवर पाहता वर्तमानपत्रात आलेल्या मजकुराबद्दल सत्यनिष्ठेची जास्त अपेक्षा असते. छापील वृत्तपत्रांचा प्रसार सुरू झाल्यापासूनच त्याची विश्वासार्हता हा मोठा गुण मानला गेला आहे. रोजच्या रोज घडत असलेल्या घटनांची माहिती करून घेण्याचे कुतूहल प्रत्येकाला असते आणि ती माहिती खोटी ठरली तर त्याची फसवणूक झाल्यामुळे त्याला राग येतो. असा अनुभव पुनःपुन्हा येऊ लागला तर तो बातम्यांचा स्रोत म्हणजे वर्तमानपत्रच बदलतो. त्यामुळे मोठा खप असलेली प्रमुख वर्तमानपत्रे धादांत खोट्या बातम्या न देण्याची काळजी घेतात. पण आपसातील स्पर्धेमुळे ताज्या ताज्या बातम्या लवकरात लवकर वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न प्रत्येक वृत्तपत्र करत असते. त्यामुळे तिच्या खोलात जाऊन पूर्ण चौकशी करण्यासाठी वेळ मिळत नाही. वरवर पाहता जेवढी माहिती विश्वसनीय वाटेल तेवढी पुरवली जाते.

वाचकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काही खास बातम्या मोठे मथळे देऊन, चौकट घालून ठळक अक्षरात छापल्या जातात. बहुतेक वृत्तपत्रांचा एक खास वाचकवर्ग असतो. त्याला सांभाळण्यासाठी त्याला रुचतील अशा बातम्यांना प्राधान्य दिले जाते. 'सत्यम् ब्रूयात' या बरोबरच 'प्रियम् ब्रूयात' याचासुध्दा विचार केला जातो. पण त्याखेरीज इतर वाचकांचा विचार करून आणि नवे वाचक मिळवण्याच्या दृष्टीने बातम्यांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्नसुध्दा होत असतो. काही नियतकालिके मात्र एकाद्या राजकीय पक्षाचा, धार्मिक किंवा जातीय संघटनेचा, विशिष्ट विचारसरणीचा प्रचार करण्यासाठीच प्रसारित होत असतात. त्यांचा समावेश मी 'वर्तमानपत्र' या संज्ञेखाली करत नाही. कारण जाणून बुजून खोटा प्रचार करणे आणि मूढ किंवा संभ्रांत लोकांची दिशाभूल करणे एवढाच त्यांचा उद्देश असतो.

टेलिव्हिजन आणि इंटरनेट या माध्यमांमधून बातम्यांच्या प्रसरणाचे नवे मार्ग उपलब्ध झाले आहेत. वृत्तपत्रांसंबंधी वर जे जे काही लिहिले आहे ते सारे या नव्या माध्यमांनासुध्दा बहुतांश प्रमाणात लागू पडते.

पण प्रतिष्ठित आणि विश्वसनीय अशा वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेल्या आणि वृत्तवाहिन्यांवर दाखवल्या गेलेल्या वार्तासुध्दा कधी कधी गोंधळात टाकतात. आरुषी प्रकरण हे याचेच एक उदाहरण आहे. दररोज येणा-या वर्तमानपत्रात कुठे ना कुठे कुणाची हत्या झाल्याच्या बातम्या येत असतात. मृत व्यक्ती जितकी प्रसिध्द किंवा उच्चपदस्थ असेल तेवढे जास्त महत्व त्या बातमीला दिले जाते. अशा वेळी त्या बातम्या मोठ्या आणि ठळक मथळ्यासह वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर देतात. किरकोळ लोकांच्या खुनाच्या बातम्या गौण असतात आणि आतल्या पानावर लहान अक्षरात दिल्या जातात, या दृष्टीने पाहता आरुषी अगदीच अज्ञात मुलगी होती, पण तिची हत्या ही एक धक्कादायक घटना होती तसेच ती रहस्यमय होती यामुळे त्या बातमीला मोठे वृत्तांतमूल्य प्राप्त झाले. दोन अडीच वर्षांपूर्वी ही घटना घडली त्या काळात काही दिवस रोजच्या रोज या संबंधी वेगवेगळा धक्कादायक मजकूर वाचायला मिळत होता.

एकाद्या रहस्यमय मालिकेला लाजवेल अशा प्रकारे रोज नवा धक्का तेंव्हा मिळत गेला होता. आरुषी नावाच्या बालिकेचा मृतदेह तिच्याच घरात तिच्या बिछान्यावरच पडलेला सापडला. राहत्या घरी झालेल्या या हत्याकांडाचा कसला आवाजसुध्दा शेजारच्या खोलीत झोपलेल्या तिच्या आईवडिलांना ऐकू गेला नाही म्हणे. बाहेरचा मजबूत मुख्य दरवाजा बंद होता आणि तो उघडून कोणी आत आला असण्याची शक्यता नव्हती. घरातला एक नोकर बेपत्ता झाला होता, पण त्याने कुठलीही वस्तू चोरली नव्हती, की आरुषीवर जबरदस्ती केल्याच्या खुणा नव्हत्या मग या निष्पाप जीवाला मारून त्याला काय मिळाले? तो नोकर रेल्वे स्टेशनकडे जातांना त्याला कोणीतरी पाहिल्याचे सांगितले गेले, पण तो त्याच्या गावी गेला नव्हता. आणखी कुठे गेला असेल याचा तपास चालला. दोन तीन दिवसानंतर त्या नोकराचा मृतदेह रहस्यमय रीत्या त्याच इमारतीच्या टाकीत सापडला. आता हे दोन खून एकाच व्यक्तीने केले होते की वेगवेगळ्या, तसेच ते एकाच वेळी झाले होते की एकानंतर एक, तसे असल्यास त्यात आधी कोणाचा आणि नंतर कोणाचा, त्या दोन अपराधांचा एकमेकांशी संबंध असणारच, पण तो कशा प्रकारचा होता, की काही संबंधच नव्हता असे अगणित प्रश्न निर्माण झाले आणि त्यावर अनेक दिशांनी तर्ककुतर्क होत राहिले.

आरुषीच्या घरातल्या आणि वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात त्यांच्याशी संबंधित असलेल्य़ा काही लोकांच्या चारित्र्याबद्ल संशय घेतला गेला. त्याबद्दल पसरलेल्या अफवा. संबंधित लोकांनी केलेला त्यांचा इन्कार आणि त्यामुळे झालेल्या त्यांच्या चारित्र्यहननाविरुध्द केलेल्या कारवाया यांच्या बातम्या येत गेल्या. आरुषीच्या वडिलांना अटक करून त्यांची चौकशी झाली. तपास करण्याचे काम एका सरकारी खात्याकडून दुस-या खात्याकडे सोपवण्यात आले. आणखी काही लोकांना अटक आणि त्यांची चौकशी झाली. दरम्यान ही बातमी शिळी झाल्यामुळे मागे पडली आणि लोकांच्या स्मरणातूनही गेली असेल.

मध्यंतरीच्या काळात काय झाले ते माहीत नाही. पण काही दिवसांपूर्वी अशी एक लहानशी बातमी आली होती की ही चौकशी बंदच करण्याची शिफारस केली गेली आहे. त्याला आक्षेप घेऊन तपास चालू ठेवावा आणि गुन्हेगाराला शोधून काढून त्याला शिक्षा करण्यात यावी अशी मागणी आरुषीच्या वडिलांनी केली असे त्यानंतर समजले. खटला भरण्याइतका भक्कम पुरावा आपल्यापाशी नसला तरी अजूनही तेच मुख्य संशयित आहेत असे स्पष्टीकरण त्यावर देण्यात आले आणि जमा झालेला परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरून हा खटला चालवणे शक्य आहे असा त्यावर निर्वाळा दिला गेला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे आता त्यावर कोणीही आपले मत मांडू शकत नाही. पण आतापर्यंत छापून आलेल्या बातम्यांमधली विसंगती पाहता नक्की काय काय घडले ते देवच जाणे असाच विचार मात्र मनात येतो.

Saturday, February 05, 2011

संगीत साधना - पूर्वीच्या काळातली आणि आताची परिस्थिती (भाग ३)

सत्तर ऐंशी वर्षापूर्वीच्या काळातल्या मध्यम वर्गीय घरांमधले वातावरण आजच्या मानाने खूप रूढीग्रस्त आणि काहीसे असहिष्णु होते. घरातल्या वडीलधारी माणसांनी सांगायचे आणि लहानांनी ते निमूटपणे ऐकायचे असा दंडक होता. मोठ्या मंडळींच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग त्यात होत असे आणि त्यांच्या दृष्टीने कुटुंबासाठी जे चांगले असेल तेच ते सांगत असत. त्यात सर्वांचा फायदा असायचा हे खरे असले तरी लहानांच्या मनात काही वेगळा विचार आला तरी तो व्यक्त करायला ते घाबरत असत, कोणी धीटपणाने तो बोलून दाखवला तर इतर मंडळी त्याच्याकडे लक्ष देऊन त्याचे सांगणे ऐकून घेत नसत आणि ऐकून घेतल्यानंतर त्यात काही गैर दिसत नसले तरीसुध्दा, "ते ठीक आहे, पण लोक आमच्या तोंडात शेण घालतील त्याचं काय?" असे म्हणून त्याला उडवून लावत असत. स्वतंत्रपणे विचार करू शकणा-या ज्या व्यक्तींना हा मनाचा कोंडमारा असह्य होत असे त्यांना निमुटपणे बाहेरची वाट धरावी लागत असे. देशभक्ती किंवा समाजसेवा यासारख्या उदात्त कारणासाठीसुध्दा कुटुंबातून बाहेर पडावे लागलेल्या लोकांची उदाहरणे आहेत.

आजकाल मुंबईसारख्या शहरातल्या सेल्फकंटेन्ड फ्टॅटमध्ये (बंद दरवाजाच्या संस्कृतीत) राहणारे लोक काय करतात ते इतरांना समजत नाही, कोणी त्याची चौकशी करत नाही की त्यांना काही म्हणत नाही. त्यामुळे व्यक्तीस्वातंत्र्यात अनेकपटीने वाढ झाली आहे आणि लोकापवादाचा धाक उरलेला नाही. सिनेमा आणि टेलीव्हिजनच्या माध्यमातून पाश्चात्य संस्कृती आणि त्यातली मुक्त विचारसरणी या गोष्टी आज घराघरात जाऊन पोचल्या आहेत. कला आणि क्रीडा या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणा-या लोकांना लहान वयातच अमाप प्रसिध्दी, गडगंज पैसा आणि भरपूर मानसन्मान मिळतात त्यामुळे त्याच्याकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बदलली आहे. झटपट यशाच्या आशेमुळे त्या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणा-यांची गर्दी वाढत आहे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे कोचिंग क्लासेस गल्ल्या गल्ल्यात उघडले आहेत. खेळ किंवा गाण्याची उपजत आवड असली तरी त्यात प्रगती करून प्राविण्य मिळवण्याची सुलभ सोय पूर्वीच्या काळी नसायची. आताच्या काळात त्यात यत्किंचित रस किंवा गती नसलेल्या मुलांनासुध्दा आजकालचे पालक जबरदस्तीने त्यांच्या क्लासला पाठवतांना दिसतात. त्याच्यामधील स्पर्धा अनेकपटीने वाढल्यामुळे त्या क्षेत्रांमध्ये पुढे येण्यासाठी आजसुध्दा जबरदस्त संघर्ष करावा लागतोच पण या कारणासाठी आता कोणाला घर सोडून जाण्याची गरज उरली नाही.

दुस-या बाजूने विचार केला तर असे दिसते की पूर्वीच्या काळातला असहिष्णू वाटणारा समाज बराच सहृदय होता. माझ्या लहानपणी आमच्या घरातले रोजचे जेवण अतीशय साधे असायचे. कित्येक दिवस त्यात फक्त एकच कालवण असे. पण रोजचे साधे जेवण असो किंवा सणासुदीचे पंचपक्वान्नांचे असो, ठराविक दिवशी वार लावून जेवायला येणारा एकादा गरीब विद्यार्थी पंगतीला असायचा. बदाम पिस्ते. मनुका, बेदाणे वगैरेंनी भरलेल्या बरण्या आमच्या स्वयंपाकघरातल्या फडताळांमध्ये नसायच्या, पण माधुकरी मागायला आलेल्या कोणाच्याही झोळीमध्ये सढळ हाताने ओंजळभर जोंधळे घातले जात असत. एकाद्या सधन कुटुंबाच्या आधारावर मोठी झालेली माझ्या पिढीमधली काही आश्रित माणसे मला माहीत आहेत. लहानपणीच घर सोडून कर्नाटकातून बाहेर पडलेले भीमसेन महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब वगैरे अनेक भागांमध्ये जाऊन पुन्हा कर्नाटकात परत आले. या सगळ्या ठिकाणी त्यांना अन्नदाते आणि आश्रयदाते लाभले. सद्गुणी, कष्टाळू आणि गरजू लोकांना त्या काळातला समाज अनेक हातांनी आधार देत असे.

आजचे दृष्य वेगळे दिसते. 'वार लावून जेवणे', 'माधुकरी'. 'आश्रित' यासारखे शब्द आता मराठी भाषेतून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. नव्या पिढीमधल्या मुलांना त्याचा अनुभव नसल्याने अर्थ लागत नसेल. आजचे लोक सुध्दा उदारहस्ताने मदत करतात, म्हणजे समाजसेवी संस्थांना देणग्या देतात, पण फ्लॅटमध्ये राहणा-या कोणाच्याही घरात त्याच्या कुटुंबाच्या बाहेरच्या मुलाला रहाण्याजेवण्यासाठी आणून ठेवल्याचे एकही उदाहरण मला दिसत नाही. आपल्या मुलांना सर्व काही उत्कृष्ट आणि जास्तीत जास्त द्यावे अशी धडपड आजचे पालक करत असतात आणि ते करण्यासाठी आपल्या मुलांची संख्या एक किंवा दोनवर मर्यादित ठेवतात. कुटुंबनियोजनाच्या प्रसारामुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे "दुस-यांच्या मुलांना पोसण्यापेक्षा आपल्याच मुलांना जन्म दिला नसता का?" किंवा "त्यांना जर मुलांना पोसण्याची ऐपत नव्हती तर त्यांना जन्म कशाला दिला?" अशा स्वरूपाचे प्रश्न कोणाच्याही मनात उठणे साहजीक आहे. पूर्वीच्या काळात हे देवाच्या मर्जीनुसार ठरत असे आणि देवाने या जगात पाठवलेल्या जीवाला आधार देणे हे आपले कर्तव्य आहे अशी भावना लोकांच्या मनात असे. ते चित्र आता बदलले असल्यामुळे एकाद्या गुरूच्या घरी राहून आणि त्याची सेवा करून शिक्षण मिळवणे ही गोष्ट आता बहुधा संभवत नाही. असा भाबडा विचार करून एकादा मुलगा घर सोडून परागंदा झाला तर आता तो समाजकंटकांच्याच हातात सापडण्याचा मोठा धोका आहे.

पूर्वीचा काळ चांगला होता की आताचा असा प्रश्न विचारून त्याचे उत्तर मला द्यायचे नाही. त्या काळात काही जटिल समस्या होत्या, आताच्या काळातही कसोटी पाहणा-या वेगळ्या अडचणी आहेत. त्या काळात वेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध होत्या, आता निराळ्या स्वरूपाचे मार्ग निर्माण झाले आहेत. अलौकिक गुणवत्ता, अदम्य उत्साह आणि पडतील तेवढे सारे कष्ट सहन करण्याची तयारी असेल तर तशा असामान्य व्यक्ती पूर्वीच्या काळातही सगळ्या अडचणी बाजूला सारून पुढे आल्या आणि यशाच्या शिखरापर्यंत पोचल्या, भविष्यातसुध्दा तसे होणारच अशी माझी श्रध्दा आहे.

. . . . . . . . . . . . (समाप्त)

Wednesday, February 02, 2011

संगीत साधना - पूर्वीच्या काळातली आणि आताची परिस्थिती (भाग २)

इसवी सन १९३०-३५ चा काळ आजच्यापेक्षा खूप वेगळा होता. त्या काळात देशांतर्गत दूरच्या प्रवासासाठी रेल्वे हे बहुधा एकमेव साधन होते. त्यातसुध्दा लांब पल्ल्याच्या गाड्या अगदी कमी होत्या. स्लीपर कोचची कल्पनासुध्दा निघालेली नव्हती. बहुतेक प्रवासी जवळपासच्या गावांना जाणारे असल्यामुळे गाडीत झोपायची आवश्यकता भासत नव्हती. कोळशाच्या इंजिनावर चालणा-या त्या काळातल्या झुक झुक झुक झुक अगीनगाडीच्या डब्यात प्रवाशांना बसण्यासाठी लाकडाच्या फळकुट्यांची बाकडी असत. त्यात बोट बोट भर रुंदीच्या फटी असत आणि रोज नवनव्या माणसांच्या रक्ताची चव चाखायला चटावलेल्या ढेकणांच्या फौजा त्या फटींमध्ये दडलेल्या असायच्या. हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा झाली नव्हती. हिंदी बोलपट अद्याप बाल्यावस्थेत होते. त्यातली गाणी लोकांच्या तोंडात बसली नव्हती. त्यामुळे दक्षिण भारतातल्या लोकांसाठी हिंदी ही काहीशी अनोळखी भाषा होती.

अशा काळात दहा बारा वर्षे वयाचे भीमसेन दक्षिण भारतातून निघून एकट्याने प्रवास करीत उत्तर भारतात जाऊन पोचले होते. या काळात ते आजूबाजूच्या लोकांबरोबर कोणत्या भाषेत कशा प्रकारचा संवाद साधत होते ते तेच जाणो. त्यांनी आपल्या गोड आवाजात खड्या सुरात गायिलेले एकादे भजन किंवा पद ऐकल्यानंतर अधिक काही सांगायची त्यांना गरज पडत नसावी आणि कानावर पडलेल्या शब्दांवरून ते नवी भाषा लगेच शिकून घेत असावेत.

त्या दहा बारा वर्षाच्या मुलाकडे उपजीविकेचे कोणते साधन असणार? गुणग्राही आणि दयाळू लोकांच्या औदार्यावरच त्यांची गुजराण होणे शक्य होते. मिळेल ते अन्न पूर्णब्रह्म मानून गिळणे आणि जमेल तिथे हातपाय पसरून झोपणे त्यांना भाग होते. पण ते काही उपजीविकेच्या शोधार्थ घराबाहेर पडले नव्हते. हक्काचा अन्नवस्त्रनिवारा आणि मायेची पाखर देणारे आईवडिलांचे घर, जिवलग सखे या सर्वांचा त्याग करून त्यांनी हा मार्ग एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन पत्करला होता. त्यामुळे संगीताचे शिक्षण घेणे हा उद्देश सतत नजरेसमोर ठेवून जातील त्या जागी चौकशी करून आणि त्यासाठी मिळेल ती माहिती काढून जिवाचा आटापिटा करून ते प्रयत्न करत राहिले, सतत त्या मार्गावर पुढे जात राहिले आणि अखेर कुंदगोळला सवाई गंधर्वांकडे जाऊन पोचले.

शिष्यांची निवड करण्याच्या बाबतीत पं.सवाई गंधर्व अत्यंत चोखंदळ होते. योग्यता आणि निष्ठा यांची कसोशीने पारख करून घेतल्यानंतरच ते कोणाला आपले शिष्यत्व देत असत. पहिले काही महिने त्यांनी भीमसेनांना काहीच शिकवले नाही. तरीही ते त्यांच्याकडे राहून पडेल ते काम करून आणि श्रवणभक्तीमधून शास्त्रीय संगीताचे कण वेचत राहिले. अखेरीस गुरूंनी त्यांच्यावर खूष होऊन त्यांना गायनकला शिकवायला सुरुवात केल्यानंतरदेखील ते आठवड्यातून फक्त एक दिवस प्रत्यक्ष थोडेसे शिकवत असत. त्यानंतर आठवडाभर शिष्याने ते स्वर पुन्हा पुन्हा घोटून घोटून आपल्या गळ्यावर चांगले बसवले आणि गुरूला व्यवस्थितपणे गाऊन दाखवले तरच पुढचे शिकवत असत. अशा प्रकारे सुरुवातीला एकेक रागाचे शिक्षण महिनोगणती चालत असे. पं.भीमसेन जोशी यांनीच याबद्दल अनेक वेळा त्यांच्या मुलाखतीत सांगितले होते.

असे असले तरी कधीसुध्दा अगदी चुकूनही त्यांच्या बोलण्यात त्याबद्दल तक्रारीचा किंचितसा सूर देखील आला नव्हता. नेहमी त्यांच्या गुरूंबद्दल त्यांचे मन अतीव आदरानेच भरलेले असायचे. त्यांच्या काळात आजच्यासारखी यांत्रिक साधने नव्हती आणि घरकामासाठी गडीमाणसे, नोकरचाकर वगैरे ठेवणे श्रीमंतांनाच परवडत असे. त्यामुळे पाणी भरणे, झाडलोट करणे यासारखी कामे घरातले लोकच करत असत आणि घरातल्या मुलांचा त्यात सहभाग असणे साहजीक असे. माझ्या लहानपणी आमच्या घरी मी ही सगळी कामे आनंदाने केली आहेत. त्याचे श्रम वाटत नव्हते की त्यात कमीपणा वाटत नसे. उलट अभिमान वाटायचा. पं.भीमसेन जोशी यांनी लहानपणी सवाई गंधर्वांच्या घरी असली तथाकथित हलकी कामे केली असली तर त्यात काहीच जगावेगळे नव्हते. उलट ते त्यांच्या घरी मुलासारखे राहिले ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.

. . . . . . . . . . . क्रमश: . . . . .