Saturday, January 30, 2016

स्मृती ठेवुनी जाती - भाग १४ - फडके डॉक्टर आणि माई फडके (उत्तरार्ध)

आमच्या गावातल्या फडके गल्लीच्या कोप-यावरच्या अखेरच्या घरात माई फडके रहात असत. त्यांच्या घराचा दरवाजा मात्र त्या गल्लीत न उघडता मामलेदार कचेरीला जाणा-या हमरस्त्यावर उघडत होता. त्यांच्या घरापुढे मोकळे अंगण नव्हते. ते घरच रस्त्यापेक्षा थोडे उंचावर होते. चार पाच पाय-या चढून वर गेल्यावर येणारा त्याचा दरवाजा एका तीन खणी खोलीमध्ये उघडायचा. आमच्या माई बहुतेक वेळा त्या खोलीत बसलेल्या दिसायच्या किंवा आतल्या बाजूला गेलेल्या असल्या तरी त्यांना भेटायला बाहेरचे कोणीआले तर माई त्या खोलीत येऊन त्या लोकांना भेटायच्या.  मी तरी माईंना बाजारात, रस्त्यात, अगदी देवळात किंवा इतर कुणाच्या घरी सुद्धा कधीच पाहिल्याचे मला आठवत नाही. "आज मला अमक्या ठिकाणी माई भेटल्या होत्या." असे कोणाच्या बोलण्यातही येत नसे. यामुळे माई फडके आणि त्यांच्या घरातली ती पहिली खोली यांचे माझ्या मनात एक समीकरण होऊन बसले होते.

त्यांच्या घरात आतल्या बाजूला आणखी किती खोल्या असतील ते मला कधीच समजले नाही. घरामागच्या परसात त्यांनी अनेक औषधी वनस्पती लावलेल्या असाव्यात असे मात्र मला वाटायचे. मला त्यांच्या घरात आणखी काही स्त्रीपुरुष कधी कधी दिसायचे किंवा रहात असल्याचे जाणवत असे. पण त्यांचे माईंशी नेमके काय नाते होते ते काही मला समजले नाही. लहान मुलांनी फार चोंबडेपणा करायचा नसतो अशी शिकवण असल्यामुळे मी ही कधी त्यांची चौकशी केली नाही.

विधवांच्या केशवपनाची रानटी प्रथा माझ्या जन्माच्या बरीच वर्षे आधीच इतिहासजमा झालेली होती. माझ्याहून दोन किंवा तीन पिढ्यांपूर्वीच्या दोन तीन  सोवळ्या म्हाता-या बायका आमच्या  गावात एकाकी जीवन जगत होत्या. त्यांचे वृध्दापकाळामुळे वाकलेले आणि खंगलेले शरीर, सुरकुतलेला चेहेरा, त्यांच्या मनात भरलेला कडवटपणा आणि बोलण्यातला तिखटपणा यामुळे लहान मुले त्यांच्या जवळ जायलाही घाबरत असत. या सगळ्याला माई मात्र अपवाद होत्या. सोवळ्या बायकांनी नेसायच्या लाल आलवणातही त्या ग्रेसफुल दिसायच्या. त्यांच्या डोळ्यात प्रेमळपणा ओतप्रोत भरलेला असायचा. त्यांच्या चेहे-यावर कमालीचा सोज्ज्वळपणा, बोलण्यात मार्दव आणि हाताच्या स्पर्शात माया होती. त्यांनी आय़ुष्यात जे काही सोसले असेल त्याची पुसटशी जाणीवही त्याच्या वागण्यात उतरली नव्हती.  त्यांच्या अस्तित्वातच एक प्रकारचे मांगल्य आणि प्रसन्न भाव भरल्यासारखे वाटायचे. मी  एरवी खूप बुजरा असलो तरी माईंकडे जायला केंव्हाही आनंदाने तयार असे.

माईंचे बालपण कुठल्या गावात गेले होते कोण जाणे. त्या काळात त्यांच्या गावात प्राथमिक शाळा तरी होती की नाही ? त्या शाळेमध्ये मुलींना प्रवेश देत असतील कां ? या प्रश्नांची उत्तरे बहुधा नकारार्थीच असावीत. पण माई लहानपणी शाळेत गेल्या असल्या किंवा नसल्या तरी त्या अडाणी नव्हत्या. त्यांची तल्लख बुद्धी, आकलनशक्ती आणि  स्मरणशक्ती यांचा प्रत्यय  त्यांच्या बोलण्यामधून येत असेच. त्यांचे वैद्यकशास्त्राबाबतीतचे  ज्ञान दांडगे होते. त्यांच्या जादूई बटव्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या व्याधीवर रामबाण घरगुती औषध असायचे.

 हे अलंकारिक बोलणे झाले.  प्रत्यक्षात अॅलोपाथी, होमिओपाथी, आयुर्वेद, युनानी असल्या कुठल्याही पद्धतीचे स्टॅडर्ड किंवा ब्रँडेड औषध त्या सहसा देत नसत किंवा त्यांनी सांगितलेली औषधे कुठल्याही औषधांच्या दुकानांमध्ये तयार मिळत नसत. आजारी माणसाला कोणते औषध कशा प्रकारे तयार करून द्यायचे हे माई फक्त समजाऊन सांगत असत. तुळस, बेल, दुर्वा, गवती चहा, कोरफड, अडुळसा यासारख्या वनस्पतींची पाने, आणखी कुठली फुले किंवा फळे, निरनिराळे भाजीपाले, वडाच्या किंवा पिंपळाच्या पारंब्या, आणखी कुठल्याशा झाडांची साल अशा नैसर्गिक गोष्टींचा उपयोग करायला त्या सांगत. ती सगळी झाडे आमच्या घराच्या किंवा शाळेच्या परिसरात होती आणि औषधी उपयोगासाठी त्यांची औषधापुरती तोड केली तर कोणी काही म्हणत नसत.
माईंची बरीचशी औषधे सुंठ, ओवा, ज्येष्ठमध, जायफळ, वेलदोडे, लवंग, जिरे, मिरे, दालचिनी वगैरे स्वयंपाकघरातल्या पदार्थांपासून तयार करायची असत. त्यात शहाजिरे, नाकेशर, पिंपळी वगैरे काही मसाल्याचे स्पेशल पदार्थ असत त्यांची नावेही मला आता आठवत नाहीत. सैंधव, पादेलोण, नवसागर यासारखी काही खनिजे असत. हे सगळे पदार्थ गावातल्या प्रमुख वाण्याच्या दुकानंमध्ये उपलब्ध असायच्या.

त्या काळात वन्यपशुसंरक्षणाचे कायदे झालेले नव्हते. सांबराचे शिंग, हस्तीदंत, वाघाचे कातडे, अस्वलाचे केस, कस्तुरीची गांठ असल्या दुर्मिळ वस्तूंचे लहानसे नमूने पिढ्यान् पिढ्या घरात ठेवलेले असत. त्यामागे काही शुभ अशुभाच्या समजुती असाव्यात. पण काही विशिष्ट कारणांसाठी त्यांचा उपयोग करायलाही माई कधीकधी सांगत असत.

माझी आई माईंची भक्त होती. ती दर महिना दीड महिन्यंमध्ये निदान एकदा तरी माईंना भेटून तिला स्वतःला आणि मुलांना झालेल्या किंवा पुन्हा पुन्हा होत असलेल्या बारीक सारीक दुखण्यांवर काही घरगुती इलाज विचारून येत असे. कोणच्या वेळी कशाचा काढा प्यायचा, कोणचे चूर्ण चाटवायचे, कुठला लेप लावायचा वगैरेची जी माहिती माझ्या आईला होती त्यातली बरीचशी तिला बहुधा माईंकडूनच मिळाली असावी. त्या उपायांवर माईंशी चर्चा करून ते औषधी पदार्थ तयार करण्याची कृती ती फाइन ट्यून करून घेत असे. माईंच्या मार्गदर्शनाखाली माझ्या आईने दिलेल्या औषधांमुळे आमची बरीचशी लहान दुखणी किंवा धडपडून झालेल्या छोट्या जखमा ठीक होऊन गेल्या होत्या.

कोणतीही औषधे तयार करतांना त्यासाठी  काय काय भाजायचे किंवा शिजवायचे, कुटायचे, वाटायचे किंवा दळायचे आणि कोणत्या क्रमाने व कोणत्या प्रमाणात त्यांना मिसळायचे याची सविस्तर कृती माई त्यांच्या स्मरणामधून तोंडी सांगत असत आणि माझी आई ते लक्षात ठेऊन त्याप्रमाणे आचरणात आणीत असे.  त्या दोघींना कदाचित कागदावर शाईने लिहिणे फारसे आवडत नसेल, पण या औषधोपचारांचे सगळे ज्ञान लिहून ठेवायची बुद्धी त्यावेळी आम्हा कोणालाही झाली नाही आणि त्या व्यक्तींच्या बरोबर ते ज्ञानही नाहीसे होऊन गेले.   मुंबईला रहात असतांना त्या औषधांसाठी लागणारी द्रव्ये मिळणे अशक्यच होते, यामुळे कदाचित त्याचा प्रत्यक्षात फारसा उपयोग झालाही नसता, पण ती माहिती म्हणून जपून ठेवली गेली असती आणि कदाचित कधी तरी कोणाला तरी त्यावर संशोधन करायला देता आली असती.

माझी आई माझ्या लहानपणीची एक आठवण आवर्जून सर्वांना सांगत असे. मी तान्हे बाळ असतांना चांगले बाळसे धरले होते. उठून बसणे, उभे राहणे, चालणे, बोलणे वगैरें बाबतीत माझी व्यवस्थित प्रगति होत होती. पण मी दीड दोन वर्षांचा झालो असतांना काय निमित्त झाले कोण जाणे, एकाएकी माझ्या पायांमधली शक्ती कमी व्हायला लागली. मी उभासुद्धा राहू शकत नव्हतो, दिवसरात्र लोळत पडून रहात होतो अशी परिस्थिती आली. हा पोलिओचा प्रकोप नव्हता, पण हे कशामुळे झाले होते ते ही समजत नव्हते. त्यावर फडके डॉक्टरांचा सल्ला घेतला गेला असणारच, पण त्यानी काय निदान आणि उपचार सांगितले होते ते माझ्या आईने मला कधीच सांगितले नाही. मला गुण येत नाही हे पाहून तिने मला उचलले आणि माईंच्या समोर नेऊन ठेवले. त्यांनी माझ्या आईला विचारले,  "मी सांगीन ते औषध तुम्ही त्याला द्याल?"  माझ्या आईने लगेच होकार दिला.

त्यावर माईंनी त्यांच्या गड्याला हाक मारली. तो एरवी त्यांच्या मळ्यावर काम करत असे, काही कारणाने तो कधी कधी घरी येत असे तसा त्या दिवशी आला होता. माईंनी त्याला बोलावून सांगितले,  "अरे आपल्या मळ्यातल्या अमक्या झाडाच्या बुंध्याशी तुला एका प्रकारचे किडे दिसतील. "
 " हो माई, मी पाहिले आहेत."
 "तिथे कंबरेइतका खोल खड्डा खणलास की  त्या किड्यांच्या खूप अळ्या दिसतील, त्यातल्या थोड्या पकडून या वहिनींना आणून देत जा."
संध्याकाळपर्यंत त्या अळ्या आमच्या घरी पोचल्या होत्या. माझी आई शुद्ध शाकाहारीच नाही तर पूर्णपणे अहिंसक होती. डास, ढेकूण, झुरळे यांना सुद्धा ती मारत नसे, पळवून लावायचा किंवा प्रतिबंधक प्रयत्न करायची. पण तीच माझी आई त्या अळ्यांना वाटून त्यात साखर मिसळून त्याची गोळी करून मला खाऊ घालत असे. या उपचाराने खरोखरच माझ्या अंगात चैतन्य येऊ लागले आणि मी उठून उभा रहायला आणि चालायला लागलो.   "मूकम् करोति वाचालम् पंगुम् लंघयते गिरीम्" हा श्लोक म्हणत असतांना मला माईंची आठवण हटकून येते.

माईंच्या निदानाच्या किमयेची आणखी एक गोष्ट माझी आई नेहमी सांगत असे. त्या काळात ती माझ्या मोठ्या भावाकडे रहात होती. असेच एकदा अचानक त्याच्या लहान मुलीचे केस पुंजक्या पुंजक्याने गळून पडायला लागले. स्थानिक डॉक्टर, त्वचारोग तज्ज्ञ वगैरेंनी दिलेल्या मलमांनी व तेलांनी काही फरक पडत नव्हता. तेंव्हा माझी आई सरळ आमच्या गावी जाऊन माईंच्या घरी जाऊन पोचली आणि माईंनी यावर आणखी एक अजब उपचार सांगितला. हस्तीदंताच्या लहानशा तुकड्याला शेगडीच्या प्रखर आंचेवर भाजून किंवा जाळून, त्याची पूड करून ती विशिष्ट प्रकारच्या तेलात मिसळून त्वचेला लावायची असे काही तरी त्या औषधाचे स्वरूप होते.  या औषधाने त्या मुलीच्या डोक्यावरील टक्कल पडलेल्या भागावर भराभरा केस यायला लागले आणि लवकरच ते चांगले घनदाट आणि लांबसडक झाले.

माई त्या काळातल्या रूढीनुसार सोवळ्या बाईचे अत्यंत साधेपणाचे जीवन जगत होत्या.त्यांनी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा व्यवसाय केला नाही. त्या कोणाकडूनही फी घेत नसत, औषधेही विकत देत नसत. त्या फक्त जवळच्या ओळखीच्या व्यक्तींनाच, त्यातही स्त्रियांनाच तपासून आपला सल्ला देत असत.  त्यांच्याकडे रोग्यांच्या रांगा लागत नसत. ते करत असलेल्या या समाजकार्याच्या मुळाशी  फक्त परोपकारबुद्धीच असायची. मी नोकरीसाठी मुंबईला स्थायिक झाल्यानंतर माझा गावाशी संपर्क राहिला नाही. दीर्घायुषी झाल्यानंतरही कधी तरी माईंचे पिकले पान गळून पडले, पण त्याची बातमी मला लगेच लागली नाही. कालांतराने जेंव्हा समजले त्या वेळी एक पुण्यवान व्रतस्थ व्यक्तिमत्व अंतर्धान पावले असा विचार मनात आला.

Wednesday, January 20, 2016

स्मृती ठेवुनी जाती - भाग १४ फडके डॉक्टर आणि माई फडके (पूर्वार्ध)

माझ्या लहानपणी म्हणजे पन्नास साठ वर्षांपूर्वीच्या काळातली परिस्थिती खूप वेगळी होती. त्या काळात आमच्या कुटुंबाची गणना 'खाऊन पिऊन सुखी' या वर्गामध्ये होत होती. आमचे फॅमिली डॉक्टर फडकेकाका अगदी घरच्यासारखे होते. तरीही घरातले कोणीसुद्धा ऊठसूट आमच्या डॉक्टरांकडे जात नसत. घरातल्या कोणाला सर्दीखोकला, ताप, अपचन, पोटदुखी यासारखे लहान सहान विकार झाले तर सुंठ, लवंग, दालचिनी, ओवा, मिरे, बडीशोप असले स्वयंपाकघरातले पदार्थ आणि कुंड्यांमध्ये लावलेली तुळस, गवती चहा, कोरफड वगैरे वनस्पतींची पाने यांच्यापासून माझी आई एकादे चाटण किंवा काढा करून देत असे.  त्रिभुवनकीर्ती, सूतशेखराची मात्रा, अमृतांजन, सीतोपलादि चूर्ण, च्यवनप्राश, त्रिफळा चूर्ण यासारखी काही आयुर्वेदिक औषधे, व्हिक्स, अॅस्प्रो, सारिडॉन, टिंक्चर आयोडिन वगैरेसारखी काही कॉमन इंग्रजी औषधे आणि मध, एरंडेल तेल, जुने तूप अशासारख्या गोष्टी आमच्या घरातल्या औषधांच्या कपाटात ठेवलेल्या असत. गरज वाटली तर त्यातले काही तरी दिले जात असे. बहुतेक वेळा या उपचाराने आजारी माणसाला लगेच गुणही येत असे.

दोन तीन दिवस उपचार करूनही दुखणे वाढतांना दिसले किंवा एकाएकी खूप त्रास सुरू झाला तर मग फडके डॉक्टरांना बोलावले जाई. त्या काळात टेलीफोन नव्हते आणि आमच्या घरापासून डॉक्टरांचा दवाखाना किंवा घर फक्त पाच दहा मिनिटांच्या अंतरावर असल्यामुळे जाण्यायेण्यात जास्त वेळ जात नसे. कोणी तरी फडके डॉक्टरांच्या दवाखान्यात किंवा घरी जाऊन त्यांना बोलावून आणत असे. ते देखील लगबगीने आमच्याकडे येऊन जात. घरातला माझ्यासारखा एकदा मुलगा दरवाजात थांबून डॉक्टर येण्याची वाट पहात असे. आमच्या घराकडे येणा-या बोळाच्या टोकाला डॉक्टरसाहेबांची मूर्ती दिसली की लगेच "डॉक्टर आले" अशी आरोळी ठोकून तो धावत पुढे जाऊन त्यांच्या हातातली बॅग घेऊन त्यांना सन्मानाने घरी आणत असे. दरवाजामधून आत शिरल्यानंतर अंगणातच पाण्याने भरलेली एक बादली, तांब्या, अंगाला लावायचा साबण आणि हात पुसण्यासाठी टॉवेल हे तयार ठेवलेले असायचे. एकजण डॉक्टरांच्या हातावर पाणी घालत असे आणि हात धुवून होताच त्यांना हात पुसायला टॉवेल देत असे.  

घरात शिरल्यानंतर हातपाय धूत असतांनाच डॉक्टरांकडून आजारी व्यक्तीची चवकशी सुरू होत असे. ते आमच्या घरातल्या प्रत्येकाला नावाने ओळखत होते. आजारी माणसाकडे गेल्या गेल्या "काय रे" किंवा "कायगं, बघू तुला काय झालंय्", "आ कर, जीभ बाहेर काढ" "जरा दीर्घ श्वास घे", तो धरून ठेव" असे म्हणत तपासणी करता करता धीरही देत. पोट दाबून आणि कपाळ चेपून पहात, थर्मॉमीटरने ताप मोजणे आणि स्टेथोस्कोपने छातीतली धडधड पाहून नाडीही तपासत. गरज असल्यास एक इंजेक्शन टोचत. "तुला काही फारसं झालेलं नाही, दोन दिवसात उड्या मारत माझ्याकडे येऊन बरं वाटत असल्याचं सांगशील बघ." असे आजारी माणसाला सांगून बाहेर येत. त्यांचे पुन्हा एकदा साबण लावून हात धुवून आणि पुसून होईपर्यंत त्यांच्यासाठी चहाचा कप तयार झालेला असे. आमच्या त्या घरात सोफासेट नव्हता, एक प्रशस्त असा झोपाळा होता. त्यावर बसून हलके झोके घेत चहाचे घोट घेता घेता फडके डॉक्टर घरातल्या सर्वांची चौकशी करत, शिक्षण किंवा नोकरीसाठी परगावी गेलेली मुले आणि सासरी गेलेल्या मुलींचे क्षेमकल्याण विचारत आणि सगळा अपडेट करून घेत. ते म्हणजे अगदी आमच्या घरचेच झालेले होते.  

आमचे फडके डॉक्टर गोरे पान, मध्यम बांध्याचे, किंचित स्थूल म्हणावे असे होते. त्यांचा तेजःपुंज हंसरा चेहरा आणि एकंदरीतच उमदे व्यक्तीमत्व पाहूनच रुग्णाला एक प्रकारची ऊर्जा मिळत असावी. या डॉक्टरांनी आपल्याला पाहिले आहे म्हणजे आता आपण बरे होणारच अशी त्यांना  खात्री वाटत असे. त्यांच्या दवाखान्यात येत असलेल्या रुग्णांची संख्या पाहता त्यांची प्रॅक्टिस चांगली चालत होती. यामुळे ते आमच्या गावातले एक नंबरचे डॉक्टर असणार असे मला वाटायचे. आमच्या घरी येऊन आजारी व्यक्तीला पाहून गेल्यानंतर त्यांनी कधी व्हिजिट फी मागितली किंवा त्यांनी न विचारता त्यांना कोणी आणून दिली असे मी कधी पाहिल्याचे मला आठवत नाही. कदाचित सगळ्या उपचारांचा एकत्र हिशोब केला जात असेल, पण त्याने आमच्या महिन्याच्या बजेटला कधीच भार पडला नाही इतपतच तो असायचा.

डॉक्टरांनी घरी येऊन किंवा दवाखान्यात आलेल्या रोग्याला पाहिल्यानंतर ते त्यांच्या कंपांउंडरला बोलावून त्याला औषधांबद्दल सांगायचे. त्या काळात आतासारख्या औषधी गोळ्यांच्या स्ट्रिप्स नसायच्या. कंपांउंडरच्या कपाटात ठेवलेल्या अनेक बाटल्यांमध्ये निरनिराळ्या गोळ्या किंवा पॉवडरी भरून ठेवलेल्या असत. ते त्यातल्या काही गोळ्या आणि पॉवडरी मोजून काढून त्यांना खलबत्त्यात घालून कुटायचे. त्यांच्या कपाटातल्या आणखी काही कपाटांमधल्या बाटल्या किंवा शिशांमध्ये निरनिराळ्या रंगाचे द्रवपदार्थ भरलेले असायचे. कंपांउंडर काका  त्यातले काही द्रव पदार्थ मोजून एका बाउलमध्ये घालायचे. त्यात गोळ्यांची झालेली पूड आणि थोडे पाणी मिसळून ते सगळे मिश्रण एका चपट्या उभ्या बाटलीत भरायचे आणि त्यात आणखी थोडे पाणी मिसळून तो द्राव ते एका विशिष्ट पातळीपर्यंत भरायचे. त्या काळात औषधांसाठी अशा खास बाटल्या मिळत असत. एका कागदाच्या पट्टीवर कात्रीने खाचे पाडून ती पट्टी त्या बाटलीवर चिकटवायचे.  त्या खाचांवरून एका वेळी किती डोस घ्यायचा हे समजत असे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आजारी माणसाला दिवसातून दोन तीन वेळा ते डोस दिले की झाले, इतके सोपे काम असायचे.  डॉक्टर घरी येऊन गेल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ कोणी तरी दवाखान्यात जाऊन कंपांउंडरकडून औषध घेऊन येत असे. त्यानंतर दररोज किंवा एक दिवसाआड दवाखान्यात जाऊन पुन्ही ती बाटली भरून आणायची असे.

त्या काळातले कंपांउंडर खरोखरच औषधांचे कंपांउंडिंग करत असत. आता ते काम राहिले नसल्यामुळे त्याच्या ऐवजी फार्मासिस्ट्स असतात. डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर काय लिहिले आहे हे वाचून  त्याप्रमाणे ते लोक त्यांच्या दुकानांमधल्या कपाटातल्या औषधांच्या स्ट्रिप्स आणि बॉटल्स काढून देतात. पूर्वीच्या काळातल्या डॉक्टरांची फी त्यांच्या कंपांउंडरांनी मुद्दाम तयार करून  दिलेल्या औषधांसकट फक्त एक दोन रुपये एवढीच असायची, आता डॉक्टर आणि फार्मासिस्ट या दोघांनाही शंभराच्या किंवा पाचशेच्या अनेक नोटा काढून द्याव्या लागतात. ही औषधोपचाराची व्यवस्था आता इतकी महाग झाली आहे. भारतातल्या कायद्यांप्रमाणे औषधांच्या प्रत्येक दुकानात एक तरी फार्मसिस्ट असणे आवश्यक असले तरी त्यांचे असणे किंवा नसणे आपल्याला सहसा जाणवत नाही, पण अमेरिकेत मात्र आता फार्मसिस्ट हा अत्यंत महत्वाचा घटक झाला आहे.

गावाच्या एका टोकाला असलेल्या मामलेदार कचेरीच्या समोरच फडके गल्ली होती. त्यात ओळीने रहात असलेल्या इतर फडके मंडळींच्या घरांमध्ये डॉक्टरांचे सुबक घर बाहेरूनच उठून देत असे. दरवाजातून आत जाताच असलेल्या अंगणात अगदी सपाट अशी फरशी बसवलेली होती, त्यात उजव्या हाताला माडीवर जाण्यासाठी जिना होता. त्या काळात घरांचा 'बीएचके' प्रकार कोणी ऐकलादेखील नव्हता. पारंपरिक पद्धतीनुसार अंगणातून आत गेल्यावर हातभर उंचावर केलेली पडवी किंवा ओसरी, त्याच्या आत माजघऱ, स्वैपाकघर आणि इतर खोल्या होत्या. माडीवर गेल्यावर प्रशस्त दिवाणखाना आणि इतर खोल्या होत्या. पण त्यातल्या ओसरीच्या पुढे आतल्या भागात जाण्याची संधी मला कधीच मिळाली नाही. एक दोन वेळा मी डॉक्टरांना भेटण्यासाठी जरासा भीतभीतच माडीवरच्या त्यांच्या  दिवाणखान्यात गेलो असेन. तिथली सजावटसुद्धा मला थक्क करणारीच होती. डॉक्टरसाहेबांची मेडिकल प्रॅक्टिस उत्तम चालली असली तरी त्या लहान गावात त्यातून अशी कितीशी प्राप्ती होत असेल? मला वाटते की बहुधा ते पिढीजातच श्रीमंत असावेत. त्यांच्या घरातल्या सफाईदार जमीनी आणि भिंती, त्यावरचे देखणे रंग, तिथे मांडलेले उच्च दर्जाचे फर्निचर हे सगळे मला जरा वेगळेच दिसायचे.

फडके डॉक्टरांच्या एका मुलीला सांगली की बुधगांवच्या राजघराण्यात त्या काळातल्या पटवर्धन सरकारांच्याकडे दिली होती याचे सगळ्या गावालाच कौतुक वाटत असे. त्यांचा एक मुलगा त्या काळात शाळेत शिकत होता, पण माझी त्याच्याशी ही कधी गट्टी होऊ शकली नाही.  डॉक्टरीणबाई तशा स्वभावाने चांगल्या होत्या, पण त्यांचे शहरी पद्धतीचे चांगले वागणेच आम्हा गांवढळांना कृत्रिम वाटत असावे. माझ्या आईचीही त्यांच्याशी विशेष जवळीक जुळली नव्हती.  त्यांच्यातले बोलणेही बहुधा कामापुरतेच होत असावे.  आमचे फडके डॉक्टर आम्हाला घरच्यासारखे वाटत असले तरी त्यांची ही आपुलकी एकतर्फी किंवा त्यांच्यापुरतीच राहिली. मी कधीच त्यांच्या कुटुंबाचा भाग झालो नाही.

सगळे सुरळित चाललेले असतांना अचानक एक दिवस फडके डॉक्टरांच्या निधनाची दुःखद बातमी आली तेंव्हा त्याचा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला.


. . . .  . . . . . . . . . . .. . .  .. (क्रमशः)