Monday, January 28, 2013

लेफ्ट राइट की डावा उजवा (भाग १ ते ३)

लेफ्ट राइट की डावा उजवा - भाग १

परवाच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी आपल्या राजधानीमध्ये दरवर्षीसारखा जंगी कार्यक्रम झाला. सैनिक आणि पोलिसदलांच्या अनेक तुकड्या मोठ्या ऐटीत "लेफ्ट राइट", "लेफ्ट राइट" करत परेड करतांना पहायला मिळाल्या. सर्वांचे उजवे आणि डावे पाय एका लयीत पडत असतांना आणि हात एकासारखे एक वर खाली होत असतांना त्यातून अद्भुत दृष्य निर्माण होत होते. त्यात 'उजवा' आणि 'डावा' या दोन्हींचा समान वाटा होता, किंवा त्यांच्या लयबध्द हालचालींमध्ये अणुमात्र फरक वाटत नव्हता. आपल्या जीवनात मात्र आपण नेहमी डावे, उजवे असे करत असतो. 'डावे' म्हणजे कमी दर्जाचे आणि 'उजवे' तेवढे चांगल्या प्रतीचे समजले जाते. हा फरक निसर्गानेच करून ठेवला आहे असेही त्यावर सांगितले जाते.

असमानता किंवा विविधता तर निसर्गामध्ये सगळीकडे भरलेली असतेच. एका झाडाला हजारो पाने असली तरी त्यातली तंतोतंत सारखी अशी दोन पानेसुध्दा शोधून सापडत नाहीत, हाताची पाचही बोटे सारखी नसतात हे उदाहरण नेहमी दिले जाते. त्यांच्यामधील प्रत्येकाची लांबी आणि जाडी निरनिराळी असते. उजवा आणि डावा हात आकाराने सारखे असले तरी ते एकमेकांच्या प्रतिबिंबांसारखे (मिरर इमेजेस) असतात, शरीराला सिमेट्रिकल असतात. हे दोन्ही हात सारख्या प्रकारे हालचाली करू शकत असल्यामुळे एका हाताने आपण जे काम करतो तेच काम प्रयत्न केल्यास दुसऱ्या हातानेसुध्दा करू शकतो. तसे करणारे इतर लोक आपल्याला भेटतात. पण कुठलेही काम करण्यासाठी बहुतेक लोकांचा उजवा हात पटकन पुढे येतो. आनुवंशिक किंवा उपजत आलेले गुण, कळायला लागण्याच्याही आधीपासून करत आलेले अनुकरण, लावली गेलेली शिस्त अशा अनेक कारणांमुळे शरीराला तशी सवय लागते आणि नकळत ते होते. वारंवार उपयोग करण्यामुळे बहुसंख्य लोकांचा उजवा हात अधिक बलवान होतो, त्यात जास्त कौशल्य येते हे दिसतेच. सगळी कामे करणारा किंवा कोणतेही काम करायला सज्ज असलेला सहकारी बॉसचा 'उजवा हात' असतो आणि अगदी सोपे काम असले तर त्याला 'बायेँ हाथका खेल' म्हणतात.

आपल्या जगण्यातल्या बारीक सारीक बाबतींसाठीसुध्दा पूर्वजांनी असंख्य नियम करून ठेवले आहेत आणि त्यांचे अतीशय कडक पालन केले जात असे. कुठलेही चांगले काम नेहमी उजव्या हातानेच करायचे असा त्यातलाच एक नियम आहे. देवाची पूजा करतांना त्याच्या मूर्तीवर अभिषेक करणे, त्याला गंध, फूल, हळद, कुंकू, अक्षता वगैरे वाहणे, उदबत्ती किंवा निरांजन ओवाळणे, नैवेद्य दाखवणे हे सगळे फक्त उजव्या हातानेच करायचे असते, एवढेच नव्हे तर कोणाला तीर्थ आणि प्रसाद उजव्या हातानेच द्यायचा आणि त्यानेही तो उजव्या हातानेच घेतला पाहिजे. यात कुठेही डावा हात आला तर लगेच ते मोठे पाप होईल, त्याने देवाचा कोप होईल, तो त्याची शिक्षा देईल वगैरे धाक घातला जात असे. खुद्द आपले देवाधिकसुध्दा थोडे डावे उजवे करतच असत. भगवान श्रीरामाचे वर्णन "दक्षिणे लक्ष्मणोर्यस्य वामेतुजनकात्मजा" असे केले जाते. म्हणजे पराक्रम करण्यासाठी रामाचा उजवा हात असलेला लक्ष्मण उजव्या बाजूला आणि सीतामाई मात्र नेहमी डाव्या बाजूला. विठ्ठलाचे वर्णनसुध्दा "वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा" असेच.

रोजचे जेवण करतांना ताटात वाढलेल्या अन्नाला कोणीही डाव्या हाताने स्पर्श करणे खपवून घेतले जात नसे. त्याने त्या अन्नाचा अपमान वगैरे होत असे. शहरातल्या हॉटेलमध्ये काटा आणि सुरी यांच्या सहाय्याने खातांना डाव्या हातात धरलेल्या फोर्कने उचललेला घास तोंडात घालतांना आपण चूक करत आहोत अशी अपराधीपणाची भावना मनात येत असे. यातला निरर्थकपणा समजल्यावर अजूनसुध्दा मी घरी उजव्याच हाताने जेवण करतो, इतके हे संस्कार अंगात भिनलेले आहेत.

उजवा हात 'खाण्या'साठी आणि डावा हात 'धुण्या'साठी अशी त्यांच्या कामांची वाटणी करून ठेवलेली होती. ती आरोग्याच्या दृष्टीने किती योग्य आहे आणि त्यावरून आपल्या पूर्वजांचा महानपणाच कसा सिध्द होतो वगैरे त्यांचे खंदे समर्थक सांगत असतात. पण डावा हात धुवून स्वच्छ करूच नये किंवा करता येणारच नाही असे का समजायचे हे मला समजत नाही.

पण क्रीडाक्षेत्रात, विशेषतः क्रिकेटच्या खेळात लेफ्ट हँडर बॅट्समन किंवा बोलर डाव्या हाताने जी किमया करून दाखवतात ती काही वेळा इतर खेळाडूंच्या उजव्या हाताने केलेल्या कामगिरीपेक्षाही सरस असते. त्यांच्या बाबतीत डाव्या हाताची कामगिरी 'उजवी' असते असे म्हणता येईल. बहुतेक सर्व हार्मोनियमवादक डाव्या हाताने भाता भरतात आणि उजव्या हाताची बोटे पट्ट्यांवर फिरवून त्यामधून सुरांची जादू निर्माण करतात. भात्याने पेटीत हवा भरण्याचे काम तुलनेने सोपे असावे म्हणून ते डाव्या हाताने करून उजव्या हाताच्या बोटांनी जास्त कौशल्याचे काम केले जाते. पण काही डावखोरे वादक याच्या बरोबर उलट करतात. चांगले वादन करण्यासाठी दोन्ही हात तितकेच 'तयार' असावे लागतात असे एका प्रसिध्द हार्मोनियमपटूने मात्र त्याच्या मुलाखतीत सांगितले होते.

आपल्या हृदयात दोन उजवे आणि दोन डावे असे चार कप्पे असतात, त्यातल्या वरील उजव्या कप्प्यामध्ये शरीरामधले रक्त येते आणि खालच्या डाव्या कप्प्यामधून ते शरीरभर पसरते. हे काम व्यवस्थितपणे होत राहण्यासाठी चारही कप्प्यांचे काम सुरळीतपणे चालणे आवश्यक असते, पण रक्ताला शरीरात पसरून पुन्हा हृदयात परत येण्यासाठी पुरेसा दाब डाव्या कप्प्यामधून मिळतो. हा कप्पा जास्त बलवान असावा लागतो. आपल्या मेंदूचेही उजवा आणि डावा असे दोन भाग असतात आणि त्यांच्यामधली कामाची वाटणी खाली दिल्याप्रमाणे असते. डावा मेंदू किती महत्वाचा असतो हे यावरून समजते.
डावा मेंदू तर्कशुद्ध विचार करतो आणि उजवा भावनांचा.
डावा मेंदू तपशीलात जातो आणि उजवा सम्यक दृष्य पाहतो
डावा मेंदू वस्तुस्थिती पाहतो आणि उजवा कल्पनाविलास करतो
डावा मेंदू शब्द व भाषा जाणतो आणि उजवा खुणा व चित्रे
डावा मेंदू गणित व विज्ञान समजून घेतो आणि उजवा तत्वज्ञान आणि धर्म
डावा मेंदू आकलन करतो आणि उजवा ग्रहण करतो
डावा मेंदू जाणतो आणि उजवा विश्वास ठेवतो
डावा मेंदू पोच देतो आणि उजवा दाद देतो
डाव्या मेंदूला पॅटर्न समजतात तर उजव्याला ठिकाण
डावा मेंदू वस्तूचे नांव जाणतो आणि उजवा तिचे गुणधर्म
डावा मेंदू वस्तुनिष्ठ विचार करतो आणि उजवा कल्पनारम्य
डावा मेंदू धोरण ठरवतो आणि उजवा शक्यता आजमावतो
डावा मेंदू प्रॅक्टिकल असतो उजवा मनस्वी
डावा मेंदू सुरक्षितता पाहतो आणि उजवा धोका पत्करतो.

.  . . . .. ................................... (क्रमशः)
----------------------------------------------------------------------------------------

लेफ्ट राइट की डावा उजवा - भाग २

"लेफ्ट राइट", 'डावे', 'उजवे' या गोष्टी फक्त आपले हात, पाय, हृदय, मेंदू वगैरे शरीरामधील भागांपुरत्या मर्यादित नाहीत. जीवनात पदोपदी त्या आपल्यासमोर येत असतात. आपल्या शिक्षणाची सुरुवात अक्षर आणि अंक यांच्या ओळखीने होते. अक्षरे, शब्द, वाक्ये यामधून भाषा शिकल्यानंतर त्या भाषेमधून आपण इतर विषय शिकतो. पण त्यासाठी ती अक्षरे एका ओळीत लिहावी लागतात. कागदावर इतस्ततः पसरलेल्या अक्षरांमधून काही बोध होणार नाही. इंग्लिश, फ्रेंच यासारख्या युरोपियन भाषा 'लेफ्ट टु राईट' लिहितात, तसेच मराठी, कानडी वगैरे भारतीय भाषासुध्दा डावीकडून उजवीकडे लिहिल्या जातात. मध्यपूर्वेमधल्या अरबी, फारशी आणि भारतातल्या काश्मीरी, उर्दू वगैरे भाषा मात्र उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात. यावर अनेक विनोदही केले जातात. त्यातला एक असा आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शीत पेयांची विक्री वाढवण्यासाठी एका कंपनीने एक आकर्षक चित्रमय जाहिरात तयार केली. भाषेचा प्रश्न न पडता जगभरातील सर्वांना ती समजावी आणि तिने त्यांचे लक्ष वेधून घ्यावे असा हेतू त्या मागे होता. या जाहिरातीत तीन चित्रांचा संच होता. उन्हाने म्लान होऊन अर्धमेला झालेला एक माणूस डाव्या बाजूच्या पहिल्या चित्रात दाखवला होता, दुस-या चित्रात त्या शीतपेयाची बाटली त्याच्या तोंडाला लावली होती आणि तिस-या चित्रात तो माणूस अदम्य उत्साहाने 'याहू' करून उडी मारण्याच्या मूडमध्ये दाखवला होता. ही जाहिरात जगभरातील सर्व प्रदेशांमध्ये दाखवून झाल्यानंतर काही दिवसांनी केलेल्या सर्वेक्षणात असे दिसले की त्या काळात इतर सर्व भागात त्या शीत पेयाचा खप वाढला असला तरी मध्यपूर्वेत मात्र ते पेय प्यायला कोणीच तयार नाही. त्या लोकांनी ती जाहिरात उजवीकडून डावीकडे वाचली असेल तर त्यांना असेच वाटले असणार की एक चांगला हट्टाकट्टा नौजवान हे पेय पिऊन झाल्यावर गलितगात्र होतो. यावर हे पेय टाळण्याखेरीज ते तरी आणखी काय करतील?

अंकांची ओळख करून घेतांना १, २, ३ ..... वगैरे ९ पर्यंत सुटे अंक झाले की १०, ११ वगैरेंमध्ये डावीकडील १ या आकड्याचे मूल्य १० इतके असते आणि उजवीकडल्या आकड्याची किंमत ०, १ वगैरेसारखी कमी असते. १ या आकड्याच्या पुढे एकापुढे एक शून्ये लिहित गेल्यावर १०, १००, १०००, १००००, १००००० वगैरे करता करता डावीकडल्या १ या आकड्याची किंमत दहा दहा पटीने वाढत जाऊन कोटी, अब्ज, परार्ध वगैरे होते, पण उजवीकडल्या ० चे मूल्य मात्र शून्यावरच राहते. अंकांचा अर्थ समजायला लागताच त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार वगैरे सुरू होतात. २+३ = ५, ३ x ४ = १२ अशासारख्या समीकरणांमधून ते मांडले जातात. बीजगणितांध्ये अंकांऐवजी क्ष, य यासारखी अक्षरे आणि भूमितीमध्ये परीघ, क्षेत्रफळ वगैरेंची सूत्रे (फॉर्स्यूले) समीकरणांमधून असतात. त्रिकोणमिती (ट्रिगनॉमेट्री) आणि कॅल्क्युलसमध्ये ही सूत्रे आणि समीकरणे अधिकाधिक जटिल होत जातात. पदार्थविज्ञानामधले (फिजिक्समधले) नियमही अशा प्रकारच्या निरनिराळ्या सूत्रांमधून मांडले आणि सिध्द केले जातात. या सगळ्या समीकरणांमध्ये डावी (लेफ्ट हँड साईड) आणि उजवी (राईट हँड साइड) अशा दोन बाजू असतात आणि दोन्हींचे मूल्य समान असते. या विषयांमधली गणिते सोडवतांना समीकरणे मांडून जितकी माहिती उपलब्ध असते ती त्यांमध्ये मांडली जाते. त्यानंतर त्या समीकरणांची पुनर्रचना करून माहीत नसलेल्या किंवा अज्ञात बाबी (अननोन एंटिटीज) डावीकडे आणि माहीत असलेल्या उजवीकडे आणतात. त्यांची मूल्ये घालून ती समीकरणे सोडवल्यानंतर आपल्याला जे शोधायचे असते ते म्हणजे विचारलेला प्रश्न अखेरीस डाव्या बाजूला येतो आणि त्याचे उत्तर उजव्या बाजूला मिळते. 'डावीकडून उजवीकडे' या भाषेतल्या नियमानुसार आधी प्रश्न आणि नंतर उत्तर हा क्रम बरोबरच आहे.

रसायनशास्त्रात (केमिस्ट्रीमध्ये) सुध्दा रासायनिक क्रियांची समीकरणे असतात, पण त्यांचे स्वरूप थोडे वेगळे असते. दोन रसायनांचा संयोग होऊन त्यातून तिसरे रसायन तयार होत असेल (उदाहरणार्थ C+ O2 = CO2) तर संयोग पावणारी (रिअॅक्टंट) रसायने डाव्या बाजूला आणि त्यातून निर्माण झालेले उत्पादन (प्रॉडक्ट) उजव्या बाजूला लिहिले जाते. एका रसायनाच्या विघटनातून अनेक द्रव्ये बाहेर पडत असतील तर ते मूळ रसायन डाव्या बाजूला आणि त्यातून निघालेली द्रव्ये (Daughter products) उजव्या बाजूला मांडतात. थोडक्यात म्हणजे ही क्रिया होऊन गेलेली असल्यास भूतकाळ डाव्या बाजूला आणि वर्तमानकाळ उजव्या बाजूला आणि होणार  असल्यास वर्तमानकाळ डाव्या बाजूला आणि भविष्यकाळ उजव्या बाजूला दाखवतात. डाव्या आणि उजव्या बाजूच्या रसायनांमधील अणूंची संख्या समान असावी एवढेच यातले 'समीकरण' असते.

विज्ञानाच्या क्षेत्रामधून बाहेर पडून वाणिज्यशाखेकडे पाहिले तर  तिथेसुध्दा "लेफ्ट राइट", 'डावे', 'उजवे' या गोष्टी येतातच. त्यातल्या जमाखर्चाचा उगम अंकगणितामधूनच झाला आहे. माझ्या लहानपणी घरातला साधा जमाखर्च लिहितांना त्या वहीच्या प्रत्येक पानावर उभी रेघ मारून त्याचे डावा व उजवा असे दोन भाग केले जात असत किंवा वहीतल्या डाव्या व उजव्या पानांमध्ये मिळून महिन्याचा जमाखर्च लिहीत असत. तो लिहितांना बाहेरून घरात आलेली सारी जमा रक्कम किंवा 'आवक' डाव्या बाजूच्या पानावर लिहीत आणि खर्च झालेली किंवा 'जावक' रकम उजव्या बाजूच्या पानावर लिहिली जात असे. पण घरात आलेले सगळे धन म्हणजे उत्पन्न नसते, तसेच बाहेर गेलेले सगळे पैसे खर्च झालेले नसतात. उदाहरणार्थ बँकेमधल्या आपल्याच खात्यात पैसे ठेवले किंवा त्यातून पैसे काढून घरी आणले तर ते पहिल्यांदाही आपलेच असतात आणि नंतरही आपलेच असतात, तसेच आपण उसने घेतलेले पैसे आपल्याला परत करायचे असतात आणि कुणा विश्वासू माणसाला उसने दिले असले तर ते परत येणार असतात. चेक पेमेंट्स, क्रेडिट कार्डे, डेबिट कार्डे, ईबँकिंग, हायर परचेस वगैरेंमुळे आता रोखीचे व्यवहार कमी झाले आहेत आणि घरखर्चाचा जमाखर्च लिहिणे तर फारच कमी झाले आहे. ते काय असायचे हे पुढच्या पिढ्यांना बहुधा माहीतही असणार नाही.

लहान दुकानाचा हिशोब ठेवतांना सामानाच्या विक्रीमधून आलेले पैसे डाव्या बाजूला आणि खरेदीसाठी केलेला खर्च उजव्या हाताला मांडत असत. पण अशा एका पानावरून त्या दुकानाला कितपत नफा किंवा तोटा होत आहे हे सांगता येणार नाही कारण त्या दिवशी झालेली विक्री आणि खरेदी ही बहुधा निरनिराळ्या मालाची असू शकते. महिन्यातला जमाखर्च पाहिला तरी त्या कालावधीत जेवढे सामान दुकानात आले तेवढेच किंवा ते सगळे त्याच महिन्यात विकले गेले असे सहसा होत नाही. सामान आणि पैसे यांची सतत अदलाबदल चाललेली असते. महिन्याच्या पहिल्या दिवसाच्या तुलनेत अखेरच्या दिवशी गल्ल्यात जास्त पैसे असले आणि दुकानातल्या सामानाचा स्टॉकसुध्दा वाढला असला तर ते दुकान फायद्यात चालले आहे आणि दोन्ही गोष्टी कमी झाल्या असल्या तर ते नुकसानीत चालले आहे असे म्हणता येईल  पण त्यातली एक वाढली आणि दुसरी कमी झाली असली तर त्यांची तुलना करून पहावी लागेल. हा गोंधळ टाळण्यासाठी व्यावसायिक जमाखर्च 'डबल एंट्री बुक कीपिंग' या वेगळ्या प्रकारे लिहिला जातो. यात पैशाचा हिशोब ठेवणारे कॅशबुक असते, त्या शिवाय सामानाचा हिशोबही वेगळा ठेवला जातो. खरेदी करतांना किती सामान दुकानात आले ते डाव्या बाजूला मांडतात आणि विकले गेल्यावर त्यातले किती कमी झाले ते उजव्या बाजूला लिहिले जाते. दोन्ही पुस्तकांमधल्या डाव्या बाजूंची एकूण बेरीज केली की त्यातून जमा समजते आणि उजव्या बाजूच्या बेरजेमधून खर्च. तो कमी असला तर अर्थातच नफा झाला आणि जास्त झाला तर तोटा.

मोठा व्यवसाय किंवा कारखाना उभा करण्यासाठी जमीन, इमारती, यंत्रसामुग्री वगैरेंवर मोठा भांडवली स्वरूपाचा खर्च होतो आणि तो चालवण्यासाठी कच्चा माल, इंधन, वीज, नोकरांचे पगार वगैरेंवर खर्च होत राहतो. भांडवली खर्च (कॅपिटल) भागवण्यासाठी भाग भांडवल, दीर्घ मुदतीची कर्जे वगैरेंमधून पैसे उभे केले जातात तर चालवण्यासाठी (रनिंग एक्स्पेन्स) तात्पुरत्या मार्गांचा अवलंब केला जातो. यामुळे अशा उद्योग व्यवसायांचा 'इनकम अँड एक्स्पेंडिचर अकौंट' वेगळा असतो आणि 'बॅलन्स शीट' वेगळा काढला जातो. इनकम अँड एक्स्पेंडिचर अकौंट एक वर्ष किंवा तीन वा सहा महिने अशा विशिष्ट कालावधीसाठी असतो आणि बॅलन्स शीट एका विशिष्ट तारखेला असलेली परिस्थिती दाखवतो. दोन्हींमध्ये डावी बाजू (लेफ्ट हँड साईड) आणि उजवी बाजू (राईट हँड साइड) असतातच. याशिवाय सर्वाच महत्वाची बॉटमलाईन असते. इनकम अँड एक्स्पेंडिचर अकौंटमधली बॉटमलाईन पाहून त्या कालावधीत किती नफा किंवा तोटा झाला हे समजते आणि बॅलन्स शीटमधली बॉटमलाईन पाहून त्या तारखेला त्या कंपनीची एकंदर आर्थिक परिस्थिती कशी आहे ते कळते. कर्जे आणि इतर देणी वगळून जर तिच्याकडे भरपूर स्थावर आणि जंगम मालमत्ता असली तर एकाद्या वर्षी तोटा झाला तरी तिची परिस्थिती मजबूत असते आणि ती तग धरू शकते. याउलट तिची संपत्ती कमी होत होत शून्यावर आली तर तिचे दिवाळे निघते.

.  . . . . . . . .............. . . . . (क्रमशः)

--------------------------------------------------------------------------

लेफ्ट राइट की डावा उजवा (भाग - ३)

शिक्षण संपवून नोकरीला लागल्यानंतर अनेक लोकांचा गणित वा विज्ञान या विषयांशी संबंध रहात नाही. ते घरचा जमाखर्च ठेवत नाहीत किंवा कोणता व्यवसाय करत नाहीत. पण ते एकाद्या चांगल्या नोकरीमध्ये असतील तर त्यांना दर महिन्याला एक वेतनपत्रक (पेबिल) मिळते त्यातसुध्दा डावी बाजू (लेफ्ट हँड साईड) आणि उजवी बाजू (राईट हँड साइड) असतातच. मूळ वेतन (बेसिक पे), महागाई भत्ता, शहर भत्ता, प्रकल्प भत्ता, घरभाडे भत्ता, वाहन भत्ता, गणवेश भत्ता, प्रवास भत्ता, प्रोत्साहन भत्ता, कुटुंब नियोजन भत्ता, जादा कामाचा पगार (ओव्हरटाईम), बोनस, आणखी काही खास वेतन किंवा भत्ते (स्पेशल पे) अशा निरनिराळ्या मथळ्यांखाली त्यांना देण्यात येणारी रकम या पत्रकात डाव्या बाजूला मांडली असते. भविष्यनिर्वाहनिधी (प्रॉव्हिडेंट फंड), आयकर (इन्कम टॅक्स), त्यावर सरचार्ज, क्वार्टरमध्ये रहात असल्यास त्याचे भाडे, वीजबिल, पाणीपट्टी, मेंटेनन्स फी, टेलीफोन बिल, त्यांनी घर, मोटार, फर्नीचर, घरातली मंगलकार्ये वगैरेंसाठी कर्जे घेतली असल्यास त्यांचे हप्ते, विम्याचा हप्ता, ऑफीसातल्या सहकारी संस्था, रिलीफ फंड, म्यूच्युअल बेनेफिट फंड वगैरेंचे हप्ते अशा अनेक कारणांसाठी पगारामधून कापून घ्यायच्या रकमा उजव्या बाजूला दाखवल्या असतात. त्या सगळ्या कपातींची बेरीज करून ते पैसे त्यांना मिळणार असलेल्या डाव्या बाजूच्या एकूण रकमेमधून कमी केल्यानंतर उरलेला पगार त्या नोकराच्या बँकेतील खात्यात जमा होतो. कधी कधी तर तो अर्धामुर्धाच असतो. या सगळ्या बाबींमध्ये नेहमी बदल होत असतात. सलग तीन महिने माझ्या खात्यात पगाराची समान रकम जमा झाली असे कधी झाल्याचे मला तरी आठवत नाही. त्यामुळे आपल्याला नेमका किती पगार मिळतो हे सांगणे कठीण असते. जेवढी रकम मी पत्नीला सांगेन ती सगळी खर्च करण्याच्या योजना तिला सुचत असल्यामुळे मी तिला प्रत्यक्ष बँकेत जमा होणारी रकमच सांगू शकत होतो. कोणाचा पगार विचारणे आजकाल सभ्यपणाचे समजले जात नाही, पण लहान गावामधून जुन्या पिढीतला कोणी आला तर तो हमखास हा प्रश्न विचारीत असे, एवढेच नव्हे तर त्याच्या भाच्याला इतका किंवा जावयाला तितका पगार मिळतो हे देखील सांगत असे. मी त्याला पेबिलमधल्या लेफ्ट हँड साईडचा एकूण पगार सांगितला तर उरलेल्या पैशाचे मी काय करतो अशा संशयाच्या नजरेला तोंड द्यावे लागत असे. माझ्या ऑफीसात काम करणारे मित्र घरी आले तर त्यांच्याबरोबर बोलतांना पे स्केल्स, पे कमिशन वगैरेंची चर्चा झाली तर त्यात येणारे 'बेसिक पे'चे आकडे वेगळेच असत.

माझ्या लहानपणी आमच्या गावाच्या एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत चालत जायला पाच मिनिटे लागत असत आणि तिथल्या लोकांकडे भरपूर वेळ असे. गावातल्या गावात कुठेही जायचे म्हणजे पायीच जायचे. गावातले मातीचे रस्ते वाहनांसाठी योग्य नव्हतेच. त्यांच्या कडांना असलेली उघडी गटारे, त्यांच्या काठाला पडलेली घाण आणि त्यामधून वावरणारे घाणेरडे प्राणी यांना टाळण्यासाठी सगळे लोक रस्त्यांच्या मधोमध चालत असत. समोरून येणारे कोणी भेटले तर रस्त्याच्या मधोमध उभे राहून त्यांच्याशी बोलत आणि जरासे बाजूला होऊन एकमेकांना पुढे जाण्यासाठी वाट देत असत. एकादी बैलगाडी किंवा सायकल आली तर ती जाईपर्यंत थोडे बाजूला सरकून उभे रहात असत. क्वचित केंव्हातरी दोन बैलगाड्या अमोरसमोरून आल्या तरी बैलांनासुध्दा थोडी बुध्दी असल्यामुळे ते एकमेकांना टक्कर न देता थांबत असत. शहरात आल्यानंतर तिथले प्रशस्त रस्ते आणि त्यावरून दोन्ही दिशांनी लागलेली वाहनांची रांग पाहून माझ्या आश्चर्याला सीमा राहिली नव्हती. माणसांना चालण्यासाठी वेगळे पदपथ (फूटपाथ) असायचे. तरीही काही लोक रस्त्यावरून चालायचे, पण बहुधा डाव्या कडेने.

आजकाल वाशीमध्ये जागोजागी काही फलक लावलेले दिसतात. "उजव्या बाजूने चालण्याचे फायदे - चेनचोरांपासून बचाव आणि अपघातांपासून सुरक्षा" अशा अर्थाचे काही तरी त्यावर लिहिले असते. मी लहान असतांना कर्नाटकामधल्या एका गावातले पोलिस सगळ्या पादचा-यांना "बलगडीयिंद नडियिरी (उजव्या बाजूने चाला)" असे सांगत असतांना आठवले. आपण रस्त्याच्या उजव्या बाजूला असल्यास समोरून डाव्या बाजूने येणारे वाहन आपल्याला दिसते आणि त्याच्या वाहनचालकाचे आपल्याकडे लक्ष नसले किंवा दुचाकीवरील चेनचोराचे लक्ष असले तरी आपण काही हालचाल करून बाजूला होऊ शकतो असा उद्देश त्यामागे असावा.


रस्त्यावरील वाहतूक सुरळीतपणे चालावी यासाठी नियम करून त्यांचे सर्वांनी पालन करणे महत्वाचे आहे. इंग्लंड आणि भारतासारख्या त्यांच्या साम्राज्यातील देशांमध्ये सारी वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवतात आणि युरोप अमेरिकेसह जगाच्या इतर भागांमध्ये वाहनचालकांनी आपल्या गाड्या रस्त्याच्या उजव्या अंगाने चालवाव्यात असे नियम आहेत. वाहतूक वाढत गेल्यानंतर मोठ्या रस्त्यांमध्ये दुभाजक घालून त्यांचे दोन वेगळे भाग करण्यात आले. आता तर दोन जवळजवळ स्वतंत्र रस्तेच बांधले जातात. इंग्लंड आणि फ्रान्स यांना जोडणारा भुयारी मार्ग झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी येणारी वाहने एकमेकांच्या समोर येऊन धडकतील अशी काळजी काही लोकांना वाटत होती. एक जास्तीचे भुयार करून उजव्या बाजूच्या रस्त्याला डावीकडे आणि डाव्या बाजूच्या रस्त्याला उजवीकडे आणले गेले.

वाहतुकीच्या या नियमांनुसार ड्राइव्हिंग करणे सोयीचे व्हावे म्हणून लेफ्ट हँड ड्राइव्ह आणि राईट हँड ड्राइव्ह अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोटारगाड्या बनवल्या जातात. त्या चालवतांना चालकांना त्या गाड्या चालवण्याची सवय होते. दुस-या प्रकारची गाडी चालवतांना त्याचे भान ठेवावे लागते. एकाच रस्त्यावरून परस्परविरुध्द दोन्ही दिशांनी जाणा-या गाड्या रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत राहिल्या तर त्यांची टक्कर होणार नाही, पण एकाद्या चौकात एका गाडीला समोर जायचे असेल आणि विरुध्द दिशेने येणा-याला उजव्या हाताला वळायचे असेल तर त्याला पहिल्या गाडीला आडवे जाऊन तिचा मार्ग ओलांडून पुढे जावे लागते. यात त्यांनी धडकण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी पूर्वीच्या काळी गावांमधल्या मुख्य चौकांमध्ये ट्रॅफिक पोलिस उभे असत, अजूनही काही ठिकाणी असतात. ते आपला उजवा किंवा डावा हात कधी उभा धरून एका बाजूने येणा-या गाड्यांना थांबवून ठेवत आणि आडवा धरून त्या दिशेने जायची परवानगी देत असत. वाहतुकीत वाढ झाल्यानंतर हे काम करण्यासाठी ट्रॅफिक सिग्नल आले. त्यातल्या हिरव्या सिग्नल्समधून समोर, डाव्या किंवा उजव्या बाजूला जाण्याची अनुमती दिली जाते आणि लाल रंगाच्या दिव्याने त्यांना थांबून रहायची आज्ञा मिळते. सिग्नल्सपाशी गाड्या थांबून राहिल्यामुळे वेळेचा खोळंबा होऊ लागला हे पाहून उड्डाणपूल (ओव्हरब्रिज) किंवा भूमीगत रस्ते (सबवे) बांधण्यात आले. तरीसुध्दा मुख्य प्रवाहातून बाहेर पडून त्यांवर जाण्यासाठी रस्त्यातल्या डाव्या किंवा उजव्या लेनमध्ये जावे लागते. यातली गंमत किंवा विसंगती अशी आहे की मुंबईमधल्या रस्त्यावर गाडी चालवतांना उजव्या बाजूला वळायचे असेल तर आधी रस्त्याच्या डाव्या बाजूला राहून पुलावर जाणे टाळायचे आणि अर्धा पूल झाल्यानंतर त्याच्या खालून उजवीकडे जायचे असे करावे लागते. अमेरिकेत याच्या नेमके उलट असते. आपले वाहन रस्त्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला न्यायचे असल्यास आपल्या मागे असलेल्या वाहनाच्या चालकाला ते कळणे आवश्यक असते. त्यासाठी आपल्या वाहनाच्या मागच्या बाजूला असलेला डावा किंवा उजवा दिवा लावून तसा संदेश देणे आवश्यक असते. थोडक्यात सांगायचे झाल्यास रस्त्यावरून वाहन चालवतांना आपल्याला सतत लेफ्टराईट, डावेउजवे यांचेकडे लक्ष द्यावे लागते.

'रस्ता', 'मार्ग', 'दिशा' वगैरे शब्दांच्या अर्थांची व्याप्ती वाढत जाऊन त्याने जीवनाला व्यापून टाकले. कोणत्याही प्रकारचा चांगला उपदेश किंवा सल्ला म्हणजे 'मार्गदर्शन' झाले आणि तो वाईट असल्यास 'वाकडी वाट दाखवणे' झाले. जगभरातली राजेशाही नष्ट किंवा निष्प्रभ होऊन तिचे जागी आलेल्या पर्यायी राजकीय व्यवस्थांमुळे सत्तेसाठी राजकारण सुरू झाले. त्यात विभिन्न प्रकारचे मतप्रवाह आले. औद्योगिक क्रांतीनंतर बदललेल्या सामाजिक स्थितीमध्ये सुस्थितीत असलेले 'कारखान्यांचे मालक' आणि पिळवणूक सहन करणारे 'मजूर' असे वर्ग निर्माण झाले. परंपरागत व्यवस्थेतसुध्दा सरदार, इनामदार, जमीनदार, सावकार वगैरे धनाढ्य वर्ग आणि त्यांचे गुलाम, नोकर, वेठबिगारी सेवक यांच्यामध्ये पराकोटीचे अंतर होतेच. "यातला श्रीमंत वर्ग गरीबांचे शोषण केल्यामुळेच बलवान झाला आहे. समाजातली विषमता हा मानवतेचा सर्वात मोठा शत्रू आहे, त्याचे पारिपत्य करणे अत्यावश्यक आहे" असे समजणारा एक वर्ग आणि "ही विषमता नैसर्गिक असते, मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन आणि प्रयत्न करून स्वतःची अनेक प्रकारे प्रगती करून प्रत्येक माणूस पुढे जात असतो" असे मानणारा दुसरा गट असे दोन परस्परविरोधातले मुख्य गट झाले. यातला पहिला गट भांडवलदारांच्या जिवावरच उठलेला असल्यामुळे दुस-या गटाला पाठिंबा देणे त्यांच्या फायद्याचे होते. फ्रान्समध्ये झालेल्या रक्तरंजित क्रांतीनंतर जी अनागोंदीची परिस्थिती निर्माण झाली होती त्या काळात तिथल्या लोकप्रतिनिधींच्या सभेत समाजवादी विचार करणारे लोक सभागृहातल्या डाव्या बाजूला बसायचे आणि परंपरागत रीतींचा पाठपुरावा करणारे किंवा "असल्या क्रांतीकारकांपेक्षा राजेशाहीच बरी होती" असे मानणारे सदस्य उजव्या बाजूला बसत असत. त्यामुळे राजकारणामध्ये 'डावी' आणि 'उजवी' विचारसरणी असा शब्दप्रयोग रूढ झाला. मार्क्स आणि एंजल्स यासारख्या विचारवंत लेखकांनी डावे तत्वज्ञान उभे केले. ते मान्य असणारे लोक स्वतःला 'पुरोगामी' म्हणवून घेऊ लागले आणि त्यांच्या मते विरुध्द बाजूचे लोक 'प्रतिगामी' ठरले.

पुढील कालावधीत या दोन्हींमध्ये मवाळ, मध्यममार्गी, जहाल, अतीजहाल असे अनेक पंथ उदयाला आले. साम्यवादी किंवा कम्यूनिस्टांनी रशियात रक्तरंजित क्रांती घडवून आणली आणि नावापुरती 'दीनदुबळ्यांची हुकुमशाही' आणली. त्यात आधीच्या धनाढ्य लोकांची पुरती वाट लागली पण गोरगरीबांचे जीवन सुखाचे झाले असे म्हणता येणार नाही. 'सर्व मालमत्ता समाजाच्या संयुक्त मालकीची असावी' हे तत्व यशस्वी झाले नाहीच. अखेर तिथली कम्युनिस्ट राजवट बाजूला सारली गेली, सोव्हिएट युनियनची शकले झाली आणि त्यातून निघालेल्या रशियासह सगळ्या देशांमध्ये निराळ्या प्रकारची लोकशाही आली. व्यक्तीगत मालमत्ता कमावणे आणि जमवणे परत सुरू झाले. ऱशियानंतर चीनमध्येही राज्यक्रांती होऊन माओझेदोंग याने साम्यवादी राजवट सुरू केली, ती आजतागायत चालू आहे, पण पुढील काळातल्या नेत्यांनी लोकांचा कल आणि तांत्रिक क्षेत्रामध्ये घडत असलेल्या सुधारणांचा विचार करून आपली धोरणे बदलली. तिथेही काही प्रमाणात आणि निराळ्या रूपाने भांडवलशाही परत आली. अमेरिका हे सुरुवातीपासूनच भांडवलदारांचे नंदनवन म्हणून जगासमोर आहे. तिथेही डावी आणि उजवी विचारसरणी असली तरी त्यातला डावा डेमॉक्रॅटिक पक्षसुध्दा व्यक्तीस्वातंत्र्य आणि भांडवलशाहीलाच मानणारा आहे. त्याबरोबर सामाजिक बांधीलकी, समानता वगैरे गोष्टीही तो करतो. उजवा रिपब्लिकन पक्षसुध्दा फार वेगळी भाषा बोलत नाही. "सरकारने फक्त देशाचे संरक्षण, अर्थकारण आणि कायदा व सुव्यवस्था सांभाळावी, समाजाने काय करायचे ते समाज बघून घेईल." अशी अमेरिकन लोकांची सर्वसाधारण विचारसरणी आहे. दोन्ही पक्ष त्याच्या तपशीलात थोडा फरक करतात एवढेच. 'युनायटेड किंग्डम' असे मोठे नाव धारण करणा-या इंग्रजांच्या देशातसुध्दा उजव्या मताचा काँझर्व्हेटिव्ह आणि डाव्या मताचा लेबर असे दोन मुख्य राजकीय पक्ष झाले आणि आलटून पालटून ते सत्तेवर आले. लेबर पक्षाने उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण वगैरे काही समाजवादाचे प्रयोग करून पाहिले, पण ते फसल्यामुळे त्याची डावी विचारसरणी थोडी मागे पडली.

या जागतिक घटनांचे परिणाम भारतातल्या राजकीय परिस्थितीवर होत गेलेच. इथेही डावे आणि उजवे राजकीय पक्ष स्थापन झालेच, शिवाय इथल्या स्थानिक वैशिष्ट्यांमुळे त्यात जास्त रंग मिसळत गेले. कम्युनिस्ट या मूळच्या मुख्य डाव्या पार्टीमधून मार्क्सिस्ट बाहेर पडले, अतिरेकी डाव्यांची नक्षलवादी चळवळ सुरू होऊन ती फोफावत गेली. साम्यवादाचा सोज्ज्वळ लोकशाहीतला पर्याय म्हणून समाजवाद आला. त्याचे अनेक ब्रँड झाले. 'फ्री एंटरप्राईज'चा पुरस्कार करणारी उजव्या गटाची स्वतंत्र पार्टी निर्माण झाली आणि लयालाही गेली. सर्वसमावेशक काँग्रेस पक्षाने सगळ्याच विचारसरणींचा आधार घेऊन निरनिराळ्या काळात निरनिराळी धोरणे सांगितली. 'भारतीय' आणि 'जनता' या दोघांच्या नावाने उभा केलेला 'भाजप'ही आपला 'अजेंडा' बदलत राहिला. घर्म, भाषा, प्रांत वगैरेंचा स्वाभिमान सांगणारे इतर अनेक पक्ष अस्तित्वात आले, ते ढोबळपणे उजव्या बाजूचे किंवा प्रतिगामी समजले जातात. येनकेन प्रकारे जनतेमध्ये लोकप्रिय होऊन निवडणुकीमध्ये यश मिळवायचे आणि सत्ता काबीज करून ती टिकवून धरायची हा सर्वच राजकीय पक्षांचा म्हणण्यापेक्षा त्यातल्या नेत्यांचा मुख्य उद्देश दिसतो. त्यासाठी डाव्या किंवा उजव्या विचारांचा सोयिस्करपणे आधार घेतला जातो. असेच चित्र सध्या तरी दिसते. त्यांच्यात काय डावे उजवे करावे याच संभ्रमात सामान्य मतदार सापडलेला किंवा हरवलेला दिसतो.

अशा प्रकारे डावे आणि उजवे हा फरक आपल्याला पदोपदी दिसतो. इंग्रजी भाषेतल्या 'लेफ्ट' आणि 'राइट' या शब्दांना दुसरेही अर्थ आहेत. 'राइट' या शब्दाचा अर्थ 'बरोबर' असाही होतो, पण राजकारणातले 'राइट विंगर' नेहमी 'बरोबरच' असतात असे नाही. 'लेफ्ट'चा अर्थ 'गेलेले' असा होतो, पण डावे राजकारणी जायला तयार होणार नाहीत आणि जोपर्यंत समाजात असमानता आहे तोपर्यंत ते जाणार नाहीत. शरीरामधले हात, पाय आणि विज्ञान, गणित, वाणिज्य वगैरे विषयांमधील डावी बाजू (लेफ्ट हँड साईड) आणि उजवी बाजू (राईट हँड साइड) सारख्याच महत्वाच्या असतात आणि एकमेकांना पूरक असतात. त्यामुळे डावे किंवा उजवे असे म्हणण्याऐवजी डावे आणि उजवे असे म्हणायला हवे.

 . . . . ..... . . . . . . . .  .  (समाप्त)

Friday, January 25, 2013

दृष्टीभ्रम

पांडवांच्या मयसभेमध्ये अनेक मायावी दृष्ये होती. दुर्योधनाने तिथे भेट दिलेली असतांना एका जागी पाणी आहे असे त्याला वाटले म्हणून तो आपला पीतांबर सावरीत तिथून गेला आणि ती जमीन निघाली, तर दुस-या एका जागी भक्कम जमीन समजून त्याने पाऊल ठेवले तर ते पाण्यात पडून तो भिजून गेला. हे पाहतांना द्रौपदी त्याला हसून म्हणाली, "आंधळ्याचा मुलगासुध्दा आंधळा !" हा अपमान दुर्योधनाला सहन झाला नाही. त्याचा सूड उगवण्यासाठी त्याने कपत कारस्थाने केली आणि त्यातून महाभारत झाले.

"दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं." असे म्हणतात, पण आपल्यालाच एका बाजूने एक दिसले आणि दुस-या बाजूने त्याच्या विपरीत काही दिसले तर त्यातले कोणते खरे आणि कोणते खोटे, काय बरोबर आणि काय चूक हेच समजेनासे होते. त्रिमिती आकृती द्विमितीमध्ये म्हणजे सपाट कागदावर काढतांना विशिष्ट प्रकारे त्रिमितीचा भास उत्पन्न केला जातो. पण यात खुबीने असे भास निर्माण करता येतात की नक्की काय आहे तेच कळत नाही.

खाली दिलेली याची काही उदाहरणे पहातांना नक्कीच चक्रावून जाल !








Sunday, January 20, 2013

पंच लाईन

पंचमहाभूते, पंचप्राण, पंचपरमेश्वर, पंचांग वगैरेंमधल्या पंचांचा प्रपंच मला या लेखात करायचा नसून इंग्रजी भाषेमधल्या 'पंच' या शब्दाचा थोडासा पंचनामा करायचा विचार आहे. हा शब्द पहिल्यांदा ऐकला तेंव्हा मी प्राथमिक शाळेत शिकत होतो. माझ्या मोठ्या भावासोबत गणपतीच्या मखराची सजावट करतांना त्यावर काढलेल्या एका डिझाईनला मी ठिपक्याठिपक्यांची बॉर्डर काढली. पण ते ठिपके नीटपणे वर्तुळाकार आले नाहीत आणि शिवाय ते एकसारखे न आल्यामुळे चित्राची शोभा वाढण्याऐवजी कमी झाली असे वाटले. ते ठिपके कसे झाकता येतील असा विचार करतांना माझ्या भावाला एक युक्ती सुचली. त्याने वडिलांच्या कपाटातून पकडीसारखे दिसणारे एक हत्यार आणले आणि त्यात एक कागद सरकवून जोराने दाबले. कट्ट असा आवाज आला आणि कागदाला लहानसे गोल भोक पडले आणि पकड सैल करताच तेवढ्या आकाराची कागदाची चकती बाहेर पडली. ते पाहून मला खूप मजा वाटली आणि निरनिराळ्या रंगाच्या कागदांना त्या यंत्राने चावे घेऊन मी खूप रंगीबेरंगी चकत्या पाडल्या. त्यातली एक एक चकती गोंदाने मखराला चिकटवून आम्ही ते खूप सजवले. कोणाला न विचारता त्या औजाराला हात लावला आणि कागदांची नासाडी केली म्हणून आम्ही बोलणी खाल्ली, पण एक नव्या प्रकारची सजावट केल्याचे समाधान मिळाले आणि त्याचे थोडे कौतुकसुध्दा झाले. त्या औजाराला 'पंच' म्हणतात असे समजले, पण फक्त एकच भोक पाडणा-या यंत्राला पंच असे का म्हणायचे हे समजले नाही आणि ते समजून घेण्याचा प्रयत्नही करावा असे तेंव्हा वाटले नाही. त्यामुळे 'पंच' हा एक इंग्रजी भाषेतला शब्द आहे हे सुध्दा मला त्या वेळी कळले नाही. माझ्या दृष्टीने ते भोक पाडणे मुळी महत्वाचे नव्हतेच, त्यातून पडलेल्या टिकल्या उपयोगाच्या होत्या. माझ्यासाठी ते कागदाला छिद्र पाडण्याचे यंत्र नसून कागदाच्या टिकल्या तयार करण्याचे साधन होते. त्या साधनाला 'सिंगल पंच' असे म्हणतात आणि बरेच कागद एकत्र बांधून ठेवण्यासाठी त्यांच्या वरच्या कोप-यात त्या पंचने भोके पाडली जातात, त्याशिवाय ठराविक अंतरावर एकाच वेळी दोन भोके पाडणारे 'डबल पंच' सुध्दा असते, त्याचा उपयोग कागदांना फाईलमध्ये अडकवून ठेवण्यासाठी होतो वगैरे ज्ञान त्यानंतर कित्येक वर्षांनंतर झाले.

इंग्लिश भाषा शिकतांना 'पंच' म्हणजे 'जोराचा ठोसा मारणे' हा अर्थ समजला. 'चलतीका नाम गाडी' सिनेमातल्या अशोककुमारापासून ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणा-या मेरी कोमपर्यंत अनेक मुष्टीयौध्द्य़ांनी मारलेले जबरदस्त ठोसे आणि त्या खेळामधली गुद्दागुद्दी पाहतांना 'पंच' या शब्दाचे प्रात्यक्षिक पहायला मिळाले. या बॉक्सर लोकांना सराव करण्यासाठी डाव्याउजव्या हातांनी एका मागोमाग एक ठोसे भराभर मारून पाहणे आवश्यक असते, पण त्यांच्यासाठी आपले थोबाड सुजवून घ्यायला कोण तयार होईल? त्यांचे ठोसे खाण्यासाठी एक पंचिंग बॅग समोर टांगून ठेवतात आणि हे वीर त्यावर 'दे दणादण' करतात. यावरून 'पंचिंग बॅग' असा एक वाक्प्रचार तयार झाला आहे. एकादा गरीब बिचारा सोशिक माणूस भेटला तर इतर लोक त्याच्यावर डाफरून आपला राग काढून घेतांना त्याचा वापर 'पंचिंग बॅग' सारखा करतात.

मेकॅनिकल इंजिनियरिंग शिकतांना वस्तूंना आकार देण्यासाठी (मेटल वर्किंगमध्ये) 'डाय आणि पंच' या अवजारांचा वापर करायला शिकायला मिळाले. तापवलेल्या लोखंडाच्या गोळ्यापासून हातोडा, क्रँकशाफ्ट यासारख्या किंवा पातळ पत्र्यामधून चमचा, झाकण अशासारख्या वस्तू तयार करण्यासाठी त्यांना डाय आणि पंच या जोडीमध्ये ठेवून जोरात ठोकले जाते. एका पत्र्यामधून लहान लहान आकाराच्या अनेक वस्तू काढण्यासाठी किंवा त्या पत्र्याला विविध आकाराची अनेक छिद्रे पाडून त्याची जाळी किंवा चाळण बनवण्यासाठी पंचिंग मशीने असतात. कागदाला भोके पाडायच्या पंचचेच हे मोठे अवतार असतात. मोटारीच्या सांगाड्याला दारे, खिडक्या, दिवे वगैरे भाग बसवण्यासाठी पोकळ्या करण्याचे कामसुध्दा पंच करून केले जाते. अर्थातच या सगळ्या कामांमध्ये जोर लावून ठोकणे अथवा दाबणे येते.

मी नोकरीला लागल्यानंतर अनेक कारखान्यांना भेटी देतांना त्यांच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी (मेन गेटपाशी) असलेले टाईम ऑफीस दिसले. पूर्वीच्या काळी तिथे काम करणारे टाईमकीपर प्रत्येक कामगाराच्या नावाचे एक कार्ड बनवून ती सगळी कार्डे एका बोर्डावर लावून ठेवत असत. प्रत्येक कामगाराने कारखान्यात प्रवेश करतांना आणि कारखान्याच्या बाहेर पडतांना आपापले कार्ड तिथल्या पंच कार्ड मशीनवर पंच करून घ्यावे लागत असे. बसचा कंडक्टर जसा तिकीट देतांना त्याला पंच करून देतो तसे सुरुवातीच्या काळात कदाचित कारखान्यातल्या कार्डावरसुध्दा फक्त एक भोकच पडत असेल. तंत्रज्ञानात सुधारणा होत गेल्यावर रेल्वे तिकीटावर छापतात त्याप्रमाणे त्या कार्डावर तारीख, वेळ वगैरे छापले जाऊ लागले. कामगारांच्या शिफ्टची वेळ संपून गेल्यानंतर टाईमकीपर सर्व कार्डे पाहून कोण कोण कामावर आले, वेळेवर आले की उशीराने आले वगैरे माहिती ऑफीसला कळवीत असत. आता सगळ्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक झाल्या असल्यामुळे कामगार आपल्याकडे असलेले 'स्मार्ट कार्ड' तिथल्या यंत्राला फक्त दाखवतात. ते पाहून सगळी माहिती आपोआप कारखान्यातल्या मुख्य संगणकात नोंदली जाते. ते काम करण्यासाठी आता वेगळा टाईमकीपर लागत नाही. असे असले तरीसुध्दा या प्रणालीला अजूनही 'कार्डपंचिंग'च म्हणतात, सहसा कोणी त्याला 'कार्ड रीडिंग' म्हणत नाही.

मोठ्या हॉटेलात किंवा पार्टीजमध्ये दिल्या जाणा-या पेयांमध्ये अनेक वेळा 'फ्रूटपंच' या पेयाचा समावेश असतो. यात फळांना ठोसे मारून किंवा ठेचून ते काढले जाते की काय असे वाटेल. या पंचमध्ये मद्यार्कयुक्त पेयेसुध्दा असतात, त्यात कशाला ठोकले असेल? ही बहुतेक पेये कॉकटेल्स म्हणजे मिश्रपेये असतात. याच्या नावाचा उगम संस्कृतमधल्या पंचवरून पाच पेयांचे मिश्रण असा झाला असे समजते.

चाळीस वर्षांपूर्वी भारतातील उद्योगव्यवसायात काँप्यूटरचा वापर सुरू झाला तेंव्हा ते काम फक्त मेन फ्रेम काँप्यूटरवर होत असे. आज सर्वत्र दिसणारे पीसी, हार्ड ड्राइव्ह, फ्लॅश ड्राइव्ह, सीडी, डीव्हीडी वगैरेतले काहीसुध्दा नव्हते. काँप्यूटरला माहिती पुरवण्यासाठी पंच्ड कार्डांचा उपयोग होत असे. त्यासाठी एबीसीडी सारखी अक्षरे आणि १२३४ सारखे अंक यांसाठी ठरलेल्या कोडनुसार एका कार्डावर निरनिराळ्या अंतरावर चौकोनी आकाराचे लहान लहान स्लॉट्स पाडत असत. अशा कार्डांचा गठ्ठा काँप्यूटरमध्ये घातल्यावर त्यातले एक एक कार्ड त्यातल्या प्रकाशझोतात आले की छिद्रांमधून पलीकडे गेलेल्या प्रकाशावरून ती माहिती संगणकाला मिळे आणि त्याचे सॉर्टिंग, बेरजा, वजाबाक्या वगैरे करून प्रिंटआउटमधून औटपुट मिळत असे. त्यावेळी आमच्या ऑफीसात काँप्यूटर आला नसला तरी आमचे काम टीआयएफआर मध्ये होत असे त्याची जुजबी माहिती मला होती.

त्या काळात एक लहानशी घटना घडली. माझ्यापेक्षा सर्वच दृष्टीने फार मोठ्या असलेल्या माझ्या नात्यातल्या एका बुजुर्ग व्यक्तीला भेटायला मी गेलो होतो. देशकार्यासाठी ते सारखे भ्रमण करत असत आणि घरी आलेल्या वेळीसुध्दा त्यांना भेटायला आलेल्या लोकांचा वेढा त्यांना पडलेला असे. मी त्यांच्याकडे गेलो होतो त्यावेळीसुध्दा त्यांचा दरबार भरलेलाच होता. मला दारात पाहताच त्यांनी हाक मारून बोलावले आणि समोर बसवून घेतले. चहापान करता करता हवापाणी, तत्कालीन घटना वगैरे सामान्य विषयावर त्यांच्या गप्पागोष्टी चालल्या होत्या. या वार्तालापात बहुतेक वेळा तेच बोलत होते, त्यांनी विनोद केला की इतरांनी खिदळायचे, ते गंभीर झाले की गंभीर चेहरा करून "आता कसे होईल?, आता काय करायचे?" वगैरे म्हणायचे, त्यावर त्यांनी काही मार्गदर्शन केले की सगळ्यांनी माना डोलवायच्या असे चालले होते. त्या वेळातच आमचे आणखी एक नातेवाईक आत आले, अत्यंत आदरपूर्वक रीतीने एक आमंत्रणपत्रिका आणि अक्षता नेताजींच्या हातात ठेऊन म्हणाले, "आपल्या --- रावांच्या मुलाचे लग्न ठरले आहे. खरे तर आमंत्रण देण्यासाठी ते स्वतःच येणार होते, पण आता त्यांना लांबचा प्रवास झेपत नाही म्हणून त्यांनी हे काम माझ्याकडे सोपवले आहे. तरी आपण सर्वांनी या लग्नाला अवश्य यावे."
पत्रिका उघडून पाहता पाहता नेताजींनी विचारले, "हा नवरा मुलगा म्हणजे लहान असतांना आपल्याकडे यायचा तो चंदूच ना? आता तो काय करतो आहे?"
"तो एलआयसीम्ध्ये पंचऑपरेटर आहे."
"म्हणजे...? " असा क्षणभर स्वतःशीच विचार करत आणि इतर कोणालाही त्यावर बोलण्याची संधी न देता ते उद्गारले, "त्या एलआयसीच्या नोटिशींना दोन्ही बाजूने रांगेत भोके पाडलेली असतात ना? ते करायचे काम असेल."
पंच ऑपरेटर असलेला तो नवरदेव काय काम करतो हे बहुधा त्या नातेवाईकांना ठाऊक असेलही, पण ते त्यावर काही बोलले नाहीत. मी काही बोललो असतो तर "एवढ्या मोठ्या माणसाला शहाणपणा शिकवणारा हा चोंबडा कोण आला?" असेच सर्वांना वाटले असते म्हणून मीही गप्प राहिलो. त्यनंतर दोन तीन वर्षांनी मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे गेलेलो असतांना कुणाच्या तरी बोलण्यामधून त्या मुलाचा विषय निघाला.
"म्हणजे एलआयसीच्या नोटिशींना भोके पाडतो तोच ना?" ते पटकन उद्गारले. त्यांची स्मरणशक्ती तल्लख होती आणि त्यांनी पूर्वी करून घेतलेला पूर्वग्रह अजून सुटला नव्हता. पंच ऑपरेटरचे काम काय असते? हे त्यांना कोणी सांगितलेले दिसत नव्हते आणि काँप्यूटर प्रिंटआउटच्या कागदांना दोन्ही बाजूने भोकांच्या रांगा कशासाठी असतात? किंवा ती भोके कुठल्या कारखान्यात पाडली जातात? वगैरे माहितीही त्यांना कुणीच दिली नव्हती.
"आता तो ब्रँच मॅनेजर झाला आहे." हे उत्तर थोडे धक्कादायक होते. कागदाला भोके पाडायचे साधे काम करणारा मजूर एकदम ब्रँच मॅनेजर कसा झाला?
"पुरुषस्य भाग्यम् देवो न जानाति .." किंवा "काँग्रेसच्या राज्यात काय काय होईल काही सांगता येत नाही." अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दरबारी मंडळींमधून आल्या.
आता कार्डपंचिंगचे कामही शिल्लक राहिले नाही. पंच ऑपरेटरच्या जागी डाटा एन्ट्री ऑपरेटर्स आले आहेत.

व्यंगचित्रांना वाहून घेतलेले पंच नावाचे एक साप्ताहिक १८४२ पासून १९९२ पर्यंत दीडशे वर्षे चालले होते. या दीर्घ कालावधीत व्यंगचित्रकारांच्या कित्येक पिढ्यांनी त्या साप्ताहिकाची पाने चित्रांनी भरली होती. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधला ढोंगीपणा व्यंगचित्रामधून दाखवतांना त्यांनी केलेल्या पंचिंगमुळे ढोंगीपणाचे अनेक फुगे फुटले होते. या पंचवरून प्रेरणा घेऊन शंकर्स वीकली आणि मार्मिक यासारखी साप्ताहिके देशोदेशी निघाली. मार्मिककर्त्या बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांमध्ये जसा पंच होता तसाच किबहुना त्याहूनही जबरदस्त पंच त्यांच्या लेखनात आणि वक्तृत्वातही होता. ."जब तोप मुकाबिल है तो अखबार निकालो।." असे सांगत मार्मिक सुरू करून त्यांनी पुढे सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि जनमानसात उच्च स्थान पटकावून तोफखानाच आपल्या ताब्यात घेऊन दाखवला.

लेखनामध्ये, विशेषतः विनोदामध्ये पंचलाईन फार महत्वाची असते. पहिल्या सगळ्या मजकुरामधल्या अर्थाला शेवटच्या एका ओळीने एकदम वेगळे वळण लागते आणि त्यातून हास्याचा स्फोट कसा होतो याचे एक उदाहरण खाली दिले आहे.
ती धावत धावत गच्चीवर गेली. तिला धाप लागल्यामुळे गच्चीवर गेल्यावर ती उभी राहिली. तिच्या पाठोपाठ तोही धावत वर गेला. त्याने भराभरा शर्टपँट काढली, साडी, ब्लाऊज, पेटीकोट आणि इतर सगळे कपडेही काढले.
.
.
.
दोरीवर वाळत घातलेले सारे कपडे घेऊन पावसाची सर यायच्या आत दोघेही खाली उतरले.

पंचलाईन अशी असते.

Monday, January 14, 2013

भगवान परशुराम



यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥

"जेंव्हा जेंव्हा धर्माला ग्लानी येईल तेंव्हा त्याला प्रस्थापित करण्यासाठी मी जन्म घेईन" असे स्वतः विष्णूचा आठवा अवतार असलेल्या कृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश करतांना सांगितले होते. श्रीकृष्णाच्या काळात हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन वगैरे नावांचे धर्म अस्तित्वात नव्हते. त्यामुळे गीतेमधल्या 'धर्म' या शब्दाचा अर्थ वेगळा असणार. समाजातील दुष्ट प्रवृत्तींचा पाडाव करून त्यात चांगुलपणा आणावा असा बहुधा त्याचा आशय असेल. निरनिराळ्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी प्रबळ आणि उन्मत्त झालेल्या दुष्ट असुरांना नष्ट करण्यासाठी देव आणि देवतांनी अवतार घेतल्याच्या असंख्य कथा पोथ्यापुराणात आहेत, तसेच भारतभरातल्या गावोगावी असलेल्या देवस्थानांविषयी अशा आख्यायिका सांगितल्या जातात. विष्णूच्या प्रसिध्द दशावतारातल्या मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह आणि वामन या पहिल्या पाच अवतारात आवश्यक त्या क्षणी तो अवतार प्रगटला आणि अवतारकार्य संपल्यानंतर अंतर्धान पावला. राम आणि कृष्ण या दोन अवतारात मात्र त्यांच्या जन्माच्याही आधीपासून ते अवतारसमाप्तीपर्यंत सुसंगत अशी चरित्रे उपलब्ध आहेत. बौध्द धम्मातील पुराणानुसार बुध्दानेच अनेक अवतार घेतले आणि गौतम हा त्यातला अखेरचा होता. त्याने स्थापन केलेल्या धर्माला वैष्णवपंथी आचार्यांनी हिंदू धर्मामधून बाहेर ढकलले. त्यामुळे कट्टर हिंदू लोक त्याला विष्णूचा अवतार मानायला तयार होतील यात शंका आहे. शिवाय पंढरपूरचा विठोबा हाच विष्णूचा नववा अवतार आहे असेही महाराष्ट्रातले काही लोक मानतात. इतर प्रांतात अशाच प्रकारच्या समजुती असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे दशावतारातल्या बुध्द या नवव्या अवताराबद्दल मतभेद आहेत. दहावा कल्की अवतार अजून कधी येणार आहे कोण जाणे. सहावा परशुराम अवतार या सर्वांहून वेगळा आहे. त्याचे सुसंगत असे चरित्र सापडत नाही, पण अनेक तुटक तुटक कथांमध्ये त्याचा उल्लेख येतो. आमच्या शाळेचेच नाव परशुरामभाऊ हायस्कूल असे असल्यामुळे परशुराम हे नाव चांगलेच परिचयाचे होते आणि त्याच्या कथांबद्दल उत्सुकताही वाटत होती. तरीही संस्कृत भाषेतल्या कुठल्याच पुराणाचा अभ्यास मी केलेला नाही. लहानपणापासून कानावर पडलेल्या आणि वाचनात आलेल्या गोष्टींवरून परशुरामाबद्दल मला समजलेल्या चार ओळी लिहिल्या आहेत.

मी शाळेत असतांना बसच्या एका प्रवासात आमची गाडी कर्नाटकातल्या संवदत्ती नावाच्या गावी बराच वेळ थांबली होती. त्या ठिकाणी यल्लम्मा देवीचे मुख्य मंदिर आहे. ही यल्लम्मा म्हणजेच रेणुका ही जमदग्नी ऋषीची पत्नी होती. रोज पहाटे उठून नदीकाठी जायचे, तिथल्या रेतीचा घ़डा तयार करायचा आणि तो पाण्याने भरून घरी न्यायचा असा तिचा दिनक्रम होता. तिच्या ठायी असलेल्या पातिव्रत्याच्या अद्भुत शक्तीमुळे तिला हे शक्य होते. एकदा ती रोजच्याप्रमाणे नदीवर गेली असतांना गंधर्वांचा राजा तिथे आपल्या राण्यांसमवेत जलक्रीडा करत होता. हे दृष्य पाहून तिचे मन विचलित झाले आणि ती रेतीपासून घडा तयार करू शकली नाही. अनुष्ठानाला बसलेल्या जमदग्नी ऋषींना त्यासाठी हवे असलेले उदक मिळाले नाही. रेणुकेला रिकाम्या हाताने घरी परत आलेले पाहून जमदग्नी ऋषी कृध्द झाले आणि या पातकासाठी त्यांनी तिला देहांताची शिक्षा सुनावली. ती शिक्षा अंमलात आणण्याची आज्ञा आपल्या पुत्रांना केली. एकामागोमाग एका मुलाने मातेचा वध करण्यास नकार दिल्यामुळे त्यांनाही मृत्यूदंड फर्मावला. अखेर परशुरामाने पित्याची आज्ञा शिरोधार्य मानून आई आणि भावांचा शिरच्छेद केला. जमदग्नींनी त्यावर प्रसन्न होऊन परशुरामाला एक वर मागायला सांगितले. त्याने आपल्या आई आणि भावांना पुन्हा जीवंत करण्याचा वर मागून त्यांना जीवनदान दिले. ही सगळी कथा संवदत्ती येथे मलप्रभा नदीच्या किनारी घडली अशी तिथल्या लोकांची समजूत आहे. ती गंगा नदीच्या किनारी घडली असेही नंतरच्या काळात माझ्या वाचण्यात आले. 

"विनाशाय च दुष्कृताम् ।" हे परशुरामाचे मुख्य अवतारकार्य होते. त्या काळातल्या सहस्त्रार्जुन राजाने तपश्चर्या करून हजार बाहू प्राप्त केले होते. त्यामुळे तो अतीशय उन्मत्त झाला होता आणि त्या गुर्मीमध्ये प्रजेवर अत्याचार करत होता. एकदा तो आपल्या सैन्यासह शिकारीला निघाला असतांना जमदग्नी मुनींच्या आश्रमात जाऊन पोचला. तिथे त्या सर्वांचा आदरसत्कार झाला आणि त्यांना भोजनही मिळाले. पण ज्या कपिला गायीच्या सहाय्याने हे साध्य झाले होते तिलाच तो राजा बळजबरीने आपल्यासोबत घेऊन गेला. परशुरामाला हे समजल्यावर त्याला राजाच्या या कृत्याचा संताप आला आणि त्याला त्याचा जाब विचारायला गेला. त्या दोघांमध्ये तुंबळ युध्द झाले आणि परशुरामाने आपल्या परशूने सहस्रार्जुनाचे हजार हात कापून त्याला ठार मारले. याचा सूड घेण्यासाठी त्याच्या पुत्रांनी ध्यानस्थ बसलेल्या जमदग्नीची हत्या केली. यामुळे परशुरामाचा राग अनावर झाला आणि त्याने सहस्रार्जुनाचा निर्वंश करण्याची प्रतिज्ञा करून एकवीस वेळा त्याच्या कुळामधील सर्व पुरुषांचा संहार केला. परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वीला निक्षत्रिय बनवले असे सांगण्यात येते, पण ते बरोबर वाटत नाही. कारण जनक हा परशुरामाचा मित्र क्षत्रिय राजाच होता. विष्णूचा पुढचा अवतार क्षत्रियांच्या रघुवंशातच झाला.

परशुरामाने कठोर तपश्चर्या करून अनेक देवांना प्रसन्न करून घेतले होते. शंकराकडून त्याला परशू हे शस्त्र मिळाले आणि त्याने त्याचा उपयोग अनेक वेळा केला म्हणून त्याला परशुराम हे नाव मिळाले. याशिवाय भृगू ऋषींच्या कुलातला म्हणून भार्गव किंवा भार्गवराम असेही संबोधले जाते. शंकराकडूनच शिवधनुष्य आणि विष्णूकडून वैष्णव धनुष्यसुध्दा परशुरामाला मिळाले होते. परशुराम हा शस्त्रांस्त्रांच्या विद्येत पारंगत होता. त्याने एकट्याने सर्व भूमी जिंकून घेतली, पण त्याला सत्तेचा किंवा संपत्तीचा लोभ नसल्यामुळे त्याने ती कश्यप ऋषींना दान करून टाकली. त्यानंतर समुद्राला मागे हटवून तयार झालेली कोकणची नवी किनारपट्टी त्याच्याकडून घेतली आणि त्यातल्या महेंद्र पर्वतावर जाऊन एका कुटीत राहू लागला. चिपळूणजवळ हा डोंगर आहे. तिथे परशुरामाचे पुरातन देऊळ आहे. एकदा कारवारला जात असतांना आम्ही वाटेत चिपळूणला मुक्काम केला होता. तेंव्हा सकाळी लवकर उठून त्या मंदिरातही जाऊन आलो होतो. केरळमध्येसुध्दा अशाच प्रकारची आख्यायिका प्रचलित आहे आणि परशुरामाचे मंदीरही आहे.

रामचंद्र हा विष्णूचा सातवा अवतार पृथ्वीवर अवतरला होता तरीही परशुराम हा अवतारही तेंव्हा भूतलावर होताच. पण त्याला आता युध्द करण्याची गरज वाटत नसल्यामुळे त्याने आपले शिवधनुष्य मिथिलेच्या जनक राजाकडे ठेवायला दिले होते. या धनुष्याला प्रत्यंचा चढवणे हा पण जनकाने सीतेच्या स्वयंवरासाठी लावला होता. तो प्रयत्न करतांना रामाकडून त्या धनुष्याचे दोन तुकडे झाले. हे वृत्त समजताच परशुराम तिथे येऊन पोचले आणि त्याचे रामाबरोबर वाद विवाद आणि युध्द झाले. दोघेही तुल्यबळ होते. अखेर दोघांनीही आपण विष्णूचे अवतार असल्याचे ओळखले आणि त्यांच्यात समेट झाला. परशुराम आता तपश्चर्येच्या मार्गाला लागलेला असल्यामुळे त्याने आपल्याकडचे वैष्णवी धनुष्य श्रीरामचंद्राला दिले.

रामायणातला रामावतार संपून मध्ये काही काळ गेल्यानंतर महाभारतातला कृष्णावतार झाला. तरीही परशुराम होतेच. भीष्म, द्रोण आदींना परशुरामानेच शस्त्रास्त्रविद्या शिकवली. त्यांचे शिष्य असलेले द्रोणाचार्य पांडव आणि कौरवांचे शिक्षक झाले. त्यांनी अर्जुनासारखा धनुर्धर आणि.भीम व दुर्योधनासारखे गदायुध्दपटु तयार केले. पण कर्ण हा सूतपुत्र आहे असे म्हणून त्यांनी कर्णाला धनुर्विद्या द्याला नकार दिला तेंव्हा तो सरळ परशुरामाकडे गेला आणि खोटे नाव सांगून त्यांचा पट्टशिष्य बनला. त्यानेही धनुर्विद्येत प्राविण्य मिळवले होते आणि तो अर्जुनाला तुल्यबळ ठरला असता पण इथेही त्याचा घात झाला. एकदा त्याचे गुरू परशुराम कर्णाच्या मांडीवर डोके ठेऊन झोपलेले असतांना एका भुंग्याने त्याची मांडी पोखरायला सुरुवात केली. गुरूची निद्रा भंग पावू नये या विचाराने कर्णाने त्याला प्रतिकार न करता मांडीला पोखरू दिले. परशुरामांची झोप झाल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला, पण कर्णाचे कौतुक करण्याऐवजी त्यांनी त्याच्या कुलाबद्दल शंका घेतली आणि त्याने खोटे सांगितल्याचे समजल्यावर त्याला शाप दिला की "तुझ्या अंतकाळी ही धनुर्विद्या तुला उपयोगी पडणार नाही." पुढे महाभारतातल्या युध्दात कुरुक्षेत्रावर कर्णाचा अखेर असाच झाला.

माझ्या लहानपणी मुलांनी संस्कृत श्लोक पाठ करणे आवश्यक असायचे. मी असाच पाठ केलेला एक श्लोक असा होता.
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनूमांश्च विभीषणः ।
कृप: परशुरामश्च सप्तैते चिरजीविता:।।
अश्वत्थामा, बलि, व्यास, हनूमान, विभीषण, कृप आणि परशुराम हे सातजण चिरंजीव आहेत असा याचा अर्थ आहे. "हे सगळेजण अजून जीवंत आहेत तर ते कुठे रहातात?" असा बालसुलभ प्रश्न मी तेंव्हा विचारला होता. "ते हिमालयातल्या गुहेत बसून तपश्चर्या करतात." असे उत्तर त्यावर मिळाले होते. यापेक्षा चांगले उत्तर अजून मिळालेले नाही. हजारो वर्षे तपश्चर्या करत जीवंत राहणे याला काय उच्च स्वरूपाचा अर्थ आहे हे ही समजले नाही.

तर परशुरामाबद्दल अशी तुटक तुटक माहिती मिळाली, पण त्यामधून सुसंगत असे चित्र तयार होत नाही आणि जे काही दिसते ते उदात्त वाटत नाही. राम आणि कृष्ण यांच्याविषयी जो आदरभाव वाटतो तो मनात उठत नाही. यामुळे परशुराम हे नाव माझ्या दैनंदिन जीवनात कधी येत नव्हते. परवा चिपळूण इथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात परशुरामावरून वाद झाला आणि त्याला जातीय स्वरूप देण्यात आलेले ऐकून आश्चर्य वाटले. सर्व विश्वाचा कर्ता करविता समजला जाणारा विष्णू भगवान आणि त्याने घेतलेले अवतार हे सगळ्या जगासाठी होते अशीच धार्मिक कल्पना आहे. ते खरोखर अस्तित्वात होते की नव्हते हा आस्तिक नास्तिकांमधला वाद आहे. पण त्यांनासुध्दा जातीनुसार वाटून घेणे दुर्दैवी आहे.

Wednesday, January 09, 2013

रक्त आणि रक्ताभिसरणाचे नियंत्रण

शरीरामधल्या रक्ताची विविध प्रकाराने तपासणी करून आणि रक्तदाब, नाडीचे ठोके वगैरे अनेक गोष्टींचा अभ्यास करून त्याचा उपयोग रोग्याच्या शरीराची अवस्था समजून घेण्यासाठी आणि त्याच्या व्याधीचे निदान करण्यासाठी केला जातो. हे करतांना त्याच्या रक्तामध्ये काही दोष किंवा तृटी आढळल्या तर त्यावर औषधोपचार करतात. काही बाबतीत रक्ताच्या तपासणीमध्ये सगळे काही व्यवस्थित निघाले तरी व्याधीच्या निवारणीसाठी त्याच्या गुणधर्मांमध्ये थोडा बदल करणारी औषधयोजना केली जाते. रक्ताच्या गुणधर्मांचे हे नियंत्रण केंव्हा आणि कसे केले जाते याबद्दल ढोबळ स्वरूपाची सर्वसाधारण माहिती या लेखात दिली आहे.

पूर्वीच्या म्हणजे माझ्या आधीच्या पिढीच्या काळात रक्ताची तपासणी करणे सहजसाध्य नव्हते हे मी या मालिकेतल्या पहिल्या लेखात लिहिले होते. आजकाल शहरात राहणा-या लोकांच्या मुलांच्या रक्ताची तपासणी त्या मुलांच्या जन्माच्याही आधीपासून सुरू होते. मुलाची माता आणि पिता यांचे रक्तगट वेगवेगळे असतील आणि ते गट एकमेकांचे शत्रू असतील तर त्या मुलाच्या आईच्या शरीरातच मुलाच्या रक्ताच्या अँटीबॉडीज तयार होऊ लागतात आणि त्या मुलाला गर्भामध्येच त्रास सुरू होतो. त्यांचे रक्तगट माहीत असले किंवा तपासणीमधून समजले तर त्या संभाव्य धोक्याच्या निवारणासाठी आधीपासून उपचार सुरू केले जातात. पूर्वीच्या काळात ही चिकित्सा ठाऊक नसल्यामुळे काही कुटुंबांमधली मुले जन्माला येण्यापूर्वीच दगावत असत, काही वेळा मातेचाही जीव जात असे आणि त्याचा दोष त्या दुर्दैवी मातेला दिला जात असे. गर्भामधील बाळाची वाढ होत असतांना त्याच्या हृदयाचे ठोके पडणे सुरू झाले की आजकालच्या तंत्राने ते मोजले जाऊ लागतात आणि त्यावरून त्याच्या आरोग्याची माहिती मिळते. त्या बाळाच्या शरीरात होत असलेल्या रक्ताभिसरणाची माहिती डॉपलर सोनोग्राफीमधून मिळते आणि आवश्यक असल्यास त्यावर औषधोपचार केले जातात.

लहान मूल असो की मोठा माणूस, कोणालाही आलेला ताप, खोकला, अशक्तपणा वगैरेसारख्या व्याधी जास्त रेंगाळल्या तर त्याच्या रक्ताची तपासणी केली जाते. त्यात कधी हिमोग्लोबिन कमी निघते, तर कधी इसोनोफिलिया काउंट जास्त निघतो, थायरॉईडमधून निघणारे हार्मोन्स कमी किंवा जास्त सापडतात, आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम वगैरेंची उणीव असते. असे अनंत दोष रक्तात सापडू शकतात. रक्तामधला अशा प्रकारचा असमतोल एक दोन दिवसात सुधारत नाही. त्यासाठी महिनाभर किंवा काही महिने औषधोपचार, पथ्यपाणी वगैरे सांभाळावे लागते. या उपचाराने रक्तामधल्या कमतरतेत सुधारणा झाली तरी आपल्याला ती थेट जाणवत नाही आणि त्यासाठी पुन्हा पुन्हा रक्ताची तपासणी करून पहावी लागते. सुरू केलेल्या औषधाचा डोस बदलायचा किंवा औषध थांबवण्याचा निर्णय रक्ताची तपासणी करून त्यावरून घेतला जातो. काही मुलांना जन्मापासूनच असलेल्या थायरॉइड्सच्या काही आजारांत किंवा एका प्रकारच्या मधुमेहात जन्मभर औषध घ्यावे लागते. थॅलेसेमिया या आजारात जन्मभर बाहेरून रक्त द्यावे लागते. ज्यांची दोन्ही मूत्रपिंडे कामातून गेली आहेत अशा रुग्णांच्या रक्ताचे डायालिसिस करून ते शुध्द करून घ्यावे लागते. अशा प्रकारचे काही रोग पूर्वी असाध्य समजले जात. आता त्यांच्या रुग्णांच्या रक्तावर नियंत्रण ठेऊन त्या रोगांचे मॅनेजमेंट केले जाते.

आजकालची सुखासीन जीवनशैली आणि वाढता मानसिक ताण यामुळे उच्च रक्तदाब (हायपर ब्लड प्रेशर) आणि मधुमेह (डायबेटिस) या व्याधींच्या प्रमाणात असंख्यपटीने वाढ झाली आहे. मधुमेहामध्ये शरीरात तयार होणारे इन्शुलिन कमी पडल्यामुळे रक्तामधल्या साखरेचे पुरेसे ज्वलन होत नाही. यामुळे इंद्रियांना पुरेशी ऊर्जा मिळत नाही. बैठे काम करतांना ही गोष्ट कोणाच्या लक्षातही येत नाही. पण यामुळे डोळे, पाय, मूत्रपिंडे वगैरे निकामी झाल्यानंतर ते समजले तर तोवर फार उशीर झालेला असतो. त्यामुळे आता सर्वच वयाच्या लोकांनी अधून मधून आणि चाळिशी उलटून गेल्यानंतर निदान वर्षातून एकदा रक्तशर्करेची तपासणी करून घ्यावी असा सल्ला डॉक्टरच देतात. साखरेचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे या तपासणीत दिसून आले तर मधुमेहाची कोणतीही बाह्य लक्षणे दिसत नसतांनासुध्दा खाण्यावर नियंत्रण, नियमित व्यायाम आणि तरीही गरज असल्यास औषधोपचार घेऊन ते कमी करणे आवश्यक असते. यामुळे मधुमेह कायमचा बरा झाला किंवा शरीरात तयार होणारे इन्शुलिन वाढले असे कदाचित होणार नाही, पण रक्तामधले साखरेचे प्रमाण मर्यादेत राहिले तर त्यामुळे शरीरामधल्या सर्व इंद्रियांना होणारा अपाय आपण टाळू किंवा कमीत कमी करू शकतो. शरीराची होणारी झीज भरून काढण्याची क्षमता निसर्गाने त्याला दिलेली आहे. ती वयाप्रमाणे कमी कमी होत जाते. त्यामुळे आधी फक्त व्यायामानेच भागले तर काही काळाने त्याला पथ्याची जोड द्यावी लागते, त्यानंतर नियमितपणे औषध घेणे आवश्यक होऊन बसते. या औषधांमुळे रोग बरा होत नाही, फक्त तो नियंत्रणाखाली राहतो. यामुळे रक्तामधली साखर तपासल्यावंतर ती लिमिटमध्ये दिसत असली तरीसुध्दा ही औषधे घेत रहावे लागते. सुरू झाल्यालंतर बहुधा ती कायमची मागे लागतात हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. काही रुग्णांच्या बाबतीत याच्या पलीकडली अवस्था येते. औषध घेऊनसुध्दा त्यांचे शरीर जास्त इन्शुलिन तयार करू शकत नाही. अशा रोग्यांना त्यांच्या रक्तात इंजेक्शनद्वारे इन्शुलिन घुसवावे लागते. नियमितपणे तपासणी करून आहार आणि इन्शुलिन यांचे प्रमाण आणि वेळा ठरवून त्या पाळाव्या लागतात. त्यात हयगय झाली की शरीराला पुरेशी ऊर्जा न मिळाल्यामुळे त्यांची दयनीय अवस्था होते. त्यामुळे मधुमेह झालेले बहुतेक लोक रक्तातल्या साखरेवर काटेकोर नियंत्रण ठेऊन एरवी मात्र आपले आयुष्य सुखेनैव जगत असतात.    

मधुमेहाप्रमाणेच उच्च रक्तदाब हासुध्दा दुसरा गनिमी शत्रू (सायलंट किलर) आहे. लहान मुलांचे सर्व शरीरच खूप लवचिक असते. माणसाचे वय जसजसे वाढते तसा हा लवचिकपणा कमी होऊन ताठरपणा वाढत जातो, त्याची हाडे ठिसूळ होतात, मांसल भाग ताठर होतात आणि रक्तवाहिन्यासुध्दा निबर होतात. त्या लवचिक असतांना त्यातल्या रक्ताचा दाब वाढताच त्या किंचित फुगल्या की आपोआपच तो दाब कमी होत असतो. पण हा लवचिकपणा कमी झाल्यानंतर त्यांचे प्रसरण आणि आकुंचन पावणे कमी प्रमाणात होते. यामुळे उतार वयात रक्तदाबाचा विकार जडण्याची शक्यता जास्त असते आणि तो आपोआप बरा होत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातला रक्तदाब सारखा नसतो आणि तो क्षणोक्षणी बदलत असतो. त्यामुळे त्यात पडलेला लहान सहान फरक कोणाला समजतही नाही. तो फारच जास्त वाढला तर मात्र अस्वस्थ वाटू लागते आणि त्या वेळी डॉक्टरने तपासणी केल्यास तो समजतो. फार काळ तो जर तसाच राहिला तर त्याचा परिणाम रक्तवाहिन्यांवर होतो. यामुळे लहानसहान तक्रारी न उद्भवता शरीरातल्या एकाद्या भागातल्या रक्तवाहिन्या फुटतात आणि मोठा धोका उद्भवतो. मेंदूमधला रक्ताचा पुरवठा थांबला तर पक्षघाताचा (स्ट्रोक किंवा पॅरॅलिसिस) झटका येतो आणि हृदयाच्या स्नायूंना रक्त मिळाले नाही तर त्याची क्रिया बंद पडते. हे धोके टाळण्यासाठी रक्तदाबावर नियंत्रण ठेवावे लागते. याचे नियंत्रण हा खूप गुंतागुंतीचा विषय आहे आणि यासाठी निरनिराळ्या प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. त्यातले कोणते निवडायचे आणि ते किती प्रमाणात घ्यायचे हा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरच देऊ शकतात. ही औषधेसुध्दा रोग बरा करत नाहीत, त्यावर नियंत्रण ठेवतात. यामुळे ही औषधेसुध्दा सुरू झाल्यानंतर बहुधा ती कायमची मागे लागतात.

पाण्याचा प्रवाह नळामधून वाहण्यासाठी त्याला पंपाने दाब द्यावा लागतो, हे प्रेशर पुरेसे नसेल तर नळाचे पाणी वरच्या मजल्यावर चढत नाही किंवा तोटीमधून अगदी कमी जोराने येते हा अनुभव आपल्याला असतो. आपल्या शरीरात पसरलेल्या असंख्य रक्तवाहिन्या आणि त्यांच्या सूक्ष्म अशा शाखा, उपशाखा वगैरेंमधून रक्ताचा पुरेसा प्रवाह वाहण्यासाठी हृदयाला जोर लावून रक्तावर दाब द्यावा लागतो. रक्त जर दाट असेल तर जास्त दाब द्यावा लागतो आणि ते पातळ असेल तर कमी दाब पुरतो. सशक्त माणसाचे हृदय जे सहजपणे करू शकते ते दुर्बल झालेले हृदय करू शकत नाही. याचा विचार करून ज्या लोकांना मेंदू किंवा हृदयाचे विकार होऊन गेले आहेत किंवा होण्याची दाट शक्यता आहे असा लोकांना विशिष्ट औषधे देऊन त्यांचे रक्त पातळ ठेवले जाते. शरीरातले रक्ताभिसरण सतत चालत राहिलेले असले तरी काही रोग्यांच्या हृदयात किंवा इतर एकाद्या भागातले रक्त काही काळ स्थिर (स्टॅग्नंट) राहते की काय अशी शंका डॉक्टरांना येते. शरीरात किंवा बाहेर कोठेही रक्त स्थिर राहिले की ते गोठायला सुरुवात होते. अशा प्रकारे तयार झालेली रक्ताची गाठ एकाद्या अरुंद जागेत अडकली तर तिथला रक्तप्रवाह पूर्णपणे थांबतो. असे झाल्यास अनवस्था प्रसंग उद्भवतो. हे होऊ नये यासाठी रक्ताचे गोठणे (कोअॅग्युलेशन) कमी गतीने करणारी औषधे घेऊन रक्ताचा गोठणे हा गुणधर्म जाणूनबुजून बदलला जातो. मात्र या दोन्ही औषधांमुळे ती घेणा-या रोग्यांना रक्तस्त्राव झाला तर तो लवकर थांबत नाही. तो होऊ नये याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया करायची असल्यास ही औषधे काही काळ थांबवावी लागतात.

रक्तामध्ये विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण कमी केले तर त्यामुळेही रक्ताची व्हिस्कॉसिटी कमी होते. म्हणून रक्तदाब असलेल्या रोग्यांना कमी मीठ असलेले अळणी पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो, तसेच त्यांच्या रक्तातले जास्तीचे मीठ शक्य तितक्या लवकर रक्ताच्या बाहेर काढणारी औषधे दिली जातात. रक्तामधल्या स्निग्धपदार्थांचे प्रमाण आवश्यकतेहून जास्त झाले तर त्याचे कण शरीरातल्या काही ठिकाणच्या रक्तवाहिन्याच्या आतल्या बाजूला चिकटून बसतात. त्यामुळे त्या अरुंद होतात. पाण्याच्या पाइपांमध्ये गाळ साठला तर त्यातून वाहणा-या पाण्याला अडथळा निर्माण होतो, तसेच रक्ताच्या बाबतीत होऊन त्याचा प्रवाह कमी होतो. हे होऊ नये यासाठी रक्तामधल्या कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवणारी औषधे दिली जातात. .तरीही त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे (ब्लॉकेजेस) निर्माण झाले तर ते अँजिओग्राफी करून शोधले जातात आणि अँजिओप्लास्टीने ते काढले जाणे आता शक्य झाले आहे. ही खूप खर्चिक आणि कष्टप्रद उपाययोजना असली तरी अनेक लोकांचे आयुष्य त्यामुळे वाढते.

हृदयामधून निघालेले रक्त शरीरामधील दूरपर्यंतच्या भागात जाऊन पोचण्यासाठी त्यावर पुरेसा दाब द्यावा लागतो, पण तो दाब प्रमाणाबाहेर गेला की त्यातून धोके निर्माण होतात. यामुळे औषधोपचार करून तो कमी करावा लागतो. पण अशा रीतीने कमी केलेल्या दाबामुळे रक्ताचे अभिसरण कमी प्रमाणात होते. त्यामुळे हाताची किंवा पायाची बोटे सुन्न होतात, त्यांना मुंग्या येतात, मेंदूला कमी रक्त मिळाले तर तो तल्लखपणे काम करत नाही, असेसुध्दा होते. याकडे लक्ष ठेऊन हलकासा व्यायाम, प्राणायाम वगैरेंच्या मार्गाने जास्त प्राणवायू त्या अवयवांपर्यंत पोचवण्याचे प्रयत्न करत रहावे लागतात. शरीरातले रक्त सगळीकडे खेळवत रहावे लागते.

आयुर्वेदिक उपचार आणि योगासने यांनी उच्च रक्तदाब (हायपर ब्लड प्रेशर) आणि मधुमेह (डायबेटिस) हे दोन्ही रोग पूर्णपणे नाहीसे होतात असा दावा केला जातो. काही व्यक्तींच्या बाबतीत कदाचित तसे होत असेलही. पण अशा आश्वासनावर विश्वास ठेऊन औषध घेणे थांबवले आणि त्यानंतर जास्तच कठीण परिस्थिती उद्भवली असा अनुभव आलेले लोकही भेटतात.

शरीरामधील पेशींना आवश्यक तेवढा प्राणवायू रक्ताभिसरणामधून पुरवला जातो. शारीरिक श्रम करतांना जास्त प्राणवायूची गरज भासते. ती भागवण्यासाठी फुफ्फुसामधून जास्त वेगाने आणि जोरात श्वास घेतला जातो आणि हृदयही अधिक वेगाने काम करून दर मिनिटाला जास्त वेळा रक्ताचा पुरवठा करते. आपल्या शरीरामधल्या विशिष्ट ग्रंथी आपल्या नकळत हे काम करवून घेत असतात. धावत असतांना आपल्याला दम लागतो आणि नाडीचे ठोके जास्त पडत आहेत एवढेच पाहिल्यास समजते. थोडा वेळ विश्रांती घेताच दोन्ही क्रिया पुन्हा पूर्ववत होऊन जातात. पण या क्रियांवर नियंत्रण ठेवणा-या ग्रंथींमध्ये बिघाड झाला किंवा संसर्गजन्य रोग किंवा अॅलर्जिक रिअॅक्शनसारख्या कारणांमुळे कोणाकोणाला कारण नसतांना दम लागतो तर कोणाकोणाच्या नाडीचे ठोके जलद किंवा हळू पडू लागतात. ते फार वेळ जलद पडले तर हृदयाच्या स्नायूंना थकवा येऊ शकतो आणि फार हळू पडले तर मेंदूसहित कुठलेच इंद्रिय व्यवस्थित काम करू शकत नसल्यामुळे सर्व व्यवस्था कोलमडतात. या कारणाने नाडीचे ठोके म्हणजेच हृदयाचे स्पंदन सुव्यवस्थितपणे चालत राहणे अत्यंत महत्वाचे असते. यात घोटाळा झाला तर त्याचे लक्षपूर्वक निरीक्षण करून औषधोपचार करावे लागतात आणि काही रोग्यांच्या बाबतीत ते चालू ठेवणे आवश्यक असते. जास्तच गरज असल्यास कोणाला ऑक्सीजन सिलिंडरमधून कृत्रिम रीत्या जास्त प्राणवायू देतात, तर कोणाला पेसमेकर बसवून त्यात्या हृदयाला ठराविक वेगाने संदेश देतात. यासाठी फिजिओथेरापीचा उपयोगही केला जातो. क्वचित काही रोग्यांच्या हृदयाचे ठोके अनियमित गतीने पडू लागतात. त्यावरही इलाज केले जातात.

अशा रीतीने आपल्या शरीरामधील रक्त आणि त्याचे अभिसरण यांचे नियंत्रण करणे आवश्यक असते. सर्वसाधारणपणे बहुतेक काळ आपले शरीरच हे काम चोख रीतीने करत असते. त्यात होणारे किरकोळ बदल आपोआप ठीक होऊन जातात आणि आपल्याला ते समजतही नाहीत. पण हे करणे शरीराच्या क्षमतेच्या बाहेर गेले तर ते बदल वाढत जातात आणि त्यातून होणारे परिणाम घातक रूप धारण करू शकतात. त्यापूर्वीच ते कळणे आता वैद्यकीय तपासण्यांमधून साध्य झाले आहे. आवश्यकतेनुसार त्या करून घेतल्या आणि नियमित आहार, व्यायाम, प्राणायाम आणि औषधोपचार घेऊन रक्त आणि त्याचे अभिसरण नियंत्रणाखाली ठेवले तर आपले आयुरारोग्य वाढायला त्याची चांगली मदत होते.

Monday, January 07, 2013

रक्ताभिसरण आणि रक्तदाब

आपल्या रक्तात काय काय असते असे लाक्षणिक अर्थाने बोलले जाते आणि ते प्रयोगशाळेत तपासून पाहिले जातांना त्यात काय पाहिले जाते किंवा सापडते हे मी या पूर्वी दोन लेखात लिहिले होते. ही रक्ताची केमिस्ट्री (रसायनशास्त्र) झाली. पदार्थविज्ञान (फिजिक्स) या शास्त्राच्या दृष्टीकोनातून रक्ताचा अभ्यास करतांना त्यात काय दिसते हे या लेखात पाहू.


तळपायापासून मस्तकापर्यंत आपल्या शरीरात असलेली हाडे, मांस, कातडी, दात, केस, नखे वगैरे बाकीचे सर्व घटक ठरलेल्या जागीच असतात आणि आयुष्यभर त्या जागीच राहतात, पण रक्त मात्र सतत इकडून तिकडे फिरत असते. या क्षणी करंगळीत असलेल्या रक्तातला एकादा कण पुढल्या क्षणी पायात किंवा मेंदूत गेलेला असेल किंवा करंगळीतच परत आलेला असेल. शरीराच्या सर्वच भागातल्या रक्ताचा काही भाग दर सेकंदाला हृदयाकडे जातो आणि तिथून तो फुफ्फुसात जाऊन प्राणवायू घेऊन येतो आणि पुन्हा शरीरभर पसरत असतो. या क्रियेला रक्ताभिसरण असे म्हणतात. हे साध्य करण्यासाठी आपले हृदय सतत धडधडत असते.

हृदयाचे चार कप्पे असतात. त्याच्या धडधडण्याच्या क्रियेत हे चारही कप्पे एका अत्यंत सुसंबध्द अशा क्रमाने आणि नियमितपणे आकुंचन व प्रसरण पावत असतात. पहिला कप्पा प्रसरण पावताच त्याला जोडलेल्या मोठ्या रक्तवाहिनीतून शरीरातले थोडे रक्त त्या कप्प्यात येते. तिथून ते दुस-या कप्प्यात जाते, तिथून फुफ्फुसाकडे जाऊन परत येतांना मात्र ते तिस-या कप्पात येते, तिथून आधी चौथ्या कप्प्यात जाऊन तिथून तीन मोठ्या रक्तवाहिन्यांमधून शरीरात पसरते. या प्रत्येक कप्प्यांना विशिष्ट प्रकारच्या झडपा असतात. त्यांमधून रक्ताचा प्रवाह फक्त एकाच दिशेने वाहू शकतो. उंदराच्या पिंज-याचे दार उघडून तो आत प्रवेश करू शकतो पण आतल्या बाजूने तेच दार उघडून तो बाहेर येऊ शकत नाही. याचप्रमाणे आपल्या शरीरातले रक्त चित्रात दाखवल्याप्रमाणे आधीच्या कप्प्यामधून पुढच्या कप्प्यात ठराविक मार्गानेच वाहू शकते.

जेंव्हा ते चौथ्या कप्प्यामधून शरीरात ढकलले जाते त्या वेळी त्या कप्प्याच्या आकुंचनक्रियेने रक्ताला एक दाब मिळतो. हा रक्ताचा जास्तीत जास्त किंवा वरचा दाब (Systolic pressure) झाला. त्या दाबामुळे ते शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांमध्ये पसरते आणि सगळीकडून गोळा होत हृदयाकडे जाणा-या रक्तवाहिन्यांध्ये शिरून हृदयाकडे परत जाते. अर्थातच या वेळी त्याचा दाब कमी झालेला असतो. हृदयाकडून निघालेला रक्ताचा लोंढा संपला तरी रक्तवाहिन्यामधील रक्तावर कमीत कमी म्हणजे खालचा दाब (Dystolic pressure)  असतोच. रक्तावरला दाब या दोन मर्यादांमध्ये सारखा बदलत असतो. हृदयामधून जोरात बाहेर पडतांना तो सर्वात जास्त असतो आणि कमी होत सर्वात कमी पातळीवर येतो तोपर्यंत हृदयाचा पुढचा ठोका पडतो आणि त्याबरोबर रक्ताचा दाब पुन्हा वाढतो. हे सगळे एका सेकंदाच्या आत घडते.




रक्तदाबासाठी तपासणी करतांना हृदयामधून बाहेर पडणा-या रक्तवाहिनीमधील (Arteries) हे दोन्ही रक्तदाब मोजतात. त्यासाठी एका खास उपकरणाचा उपयोग केला जातो. यातला पोकळ पट्टी (कफ) दंडाभोवती घट्ट गुंडाळून त्यात हवा भरतात आणि फुगवत नेतात. या हवेच्या दाबामुळे दंडामधील रक्तवाहिनी चेपली जाते आणि तिच्यामधून हाताकडे जात असलेला रक्ताचा प्रवाह पूर्णपणे थांबतो. व्हॉल्व्ह उघडून हवा बाहेर सोडली तर हवेचा दाब कमी होतो. हवेचा दाब हळू हळू कमी करत आणला तर एका अवस्थेत हातात जाणारा रक्तप्रवाह हळू हळू सुरू होतो आणि हवेचा दाब आणखी कमी झाल्यानंतर रक्तप्रवाह पूर्ववत होतो. या तपासणीचे वेळी कानाला स्टेथास्कोप लावून हातात होत असलेल्या रक्तप्रवाहाचा आवाज ऐकतात. हवेचा दाब मोजण्यासाठी पारा भरलेली एक उभी नळी या यंत्राला जोडलेली असते. एका हाताने व्हॉल्व्ह उघडून हवा बाहेर सोडायची, त्याच वेळी कानाने स्टेथॉस्कोपमधला आवाज ऐकायचा आणि खाली जात असलेली पा-याची पातळी डोळ्याने पहायची अशी तीन कामे लक्षपूर्वक करायची असल्यामुळे ही तपासणी तज्ज्ञ डॉक्टर किंवा नर्सच करू शकतात. ही तीन्ही कामे यंत्राकरवी करवून घेऊन रक्ताचा दाब काट्याने डायलवर दाखवणारी यंत्रे निघाली आहेत आणि आता ती डिजिटल पध्दतीने आकड्यात दाखवणारी उपकरणेसुध्दा उपलब्ध झाली आहेत. पण भारतातले डॉक्टर त्यांवर फारसा भरोसा न ठेवता जुन्या उपकरणांचाच उपयोग करतात.

रक्तदाब मोजणारी उपकरणे फक्त वरचा दाब (Systolic pressure) आणि खालचा दाब (Dystolic pressure) मोजतात. पण त्यांच्या दरम्यानच्या काळात हे कशा रीतीने वाढत किंवा कमी होतात हे समजण्यासाठी अधिक सेंसिटिव्ह इन्स्ट्रुमेंटची आवश्यकता असते. ईसीजीमध्ये याचा आलेख (ग्राफ) मिळतो. हृदयाच्या एकामागोमाग पडणा-या ठोक्यांमध्ये रक्तावरचा दाब कशा प्रकारे बदलत असतो तसेच हे ठोके किती काळानंतर पडतात, ते एकसारखे असतात किंवा त्यात काही फरक असतो वगैरे सविस्तर माहिती त्यात मिळते. याच्याही पुढची पायरी आयसीसीयूमधील यंत्रात असते. त्यातल्या मॉनिटरवर हे ग्राफ सतत येत राहतात आणि रुग्णाचे हृदय कशा प्रकारे काम करत आहे हे डॉक्टरला समजते.  

ही सरळी यांत्रिक उपकरणे यंत्रयुगामध्ये तयार झाली. त्यापूर्वीच्या काळात अशी साधने नसल्यामुळे नाडीचे ठोके पाहिले जात. प्राचीन काळापासून चालत आलेल्या आयुर्वेदामध्ये नाडीपरीक्षा अत्यंत महत्वाची समजली जाते. फक्त नाडीच्या ठोक्यांचा लक्षपूर्वक अभ्यास करून शरीरातील सगळ्या इंद्रियांचे काम कसे चालले आहे हे निष्णात वैद्य जाणत असत. इंग्लिशमध्येसुध्दा परिस्थिती समजून घेणे या अर्थाने फीलिंग द पल्स असा वाक्प्रचार आहे. "तुम्ही काल दिवसभर काय काय खाल्ले आणि रात्री काय केले हे सगळे आमचा वैद्य नाडी बघून अचूक ओळखतो." असे एका बुजुर्ग माणसाने मला एकदा सांगितले होते. कदाचित हा त्याच्या गप्पिष्टपणाचा भाग असेल किंवा रोग्याने आपल्यापासून काही लपवून ठेऊ नये म्हणून त्या वैद्याने असा समज पसरवून ठेवला असेल. अशा प्रकारे नाडीपरीक्षेमधून सबकुछ जाणणारे वैद्य आजकाल सहजासहजी पहायला मिळत नसले तरी एका मिनिटात नाडीचे ठोके किती पडतात हे मात्र सगळे डॉक्टर आणि वैद्य मोजतातच. हे काम करणारी यंत्रेसुध्दा आता अनेक ठिकाणी पहायला मिळतात. एका मिनिटाला नाडीचे ठोके पडण्याचा वेग सतत दाखवत राहणारी उपकरणेसुध्दा आयसीसीयूमध्ये असतात. मिनिटाला जेवढे नाडीचे ठोके पडतात तितक्या वेळा हृदयाकडून शरीराला रक्तामधून नवा प्राणवायू मिळतो. झोपेत असतांना किंवा निपचित पडून राहिलेल्या वेळी शरीराला जेवढा प्राणवायू लागतो त्यापेक्षा कष्टाचे काम करत असतांना किंवा धावतांना जास्त प्राणवायूची गरज पडते. तो पुरवण्यासाठी नाडीचे ठोके तात्पुरते वाढतात आणि गरज कमी झाली की ते पुन्हा कमी होतात. मानसिक धक्का किंवा भीतीमुळे सुध्दा छाती धडधडते तेंव्हा नाडीचे ठोके जलदगतीने पडतात. पण या सगळ्या गोष्टी कमाल आणि किमान मर्यादांमध्येच घडतात.. 

थोडक्यात सांगायचे झाल्यास एका मिनिटात हृदयाच्या कार्याच्या चक्राची किती आवर्तने होतात, त्याची गती सारखीच राहते की त्यात बदल होतात, रोग्याच्या रक्ताचा कमाल आणि किमान दाब किती असतो. तोसुध्दा स्थिर पातळीवर असतो किंवा बदलत राहतो, या दोन्हींमध्ये होणारे बदल परिस्थितीनुसार असतात की नाही. वगैरे अनेक गोष्टींचा अभ्यास करून त्याचा उपयोग रोग्याच्या शरीराची अवस्था समजून घेऊन त्याच्या व्याधीचे निदान करण्यात केला जातो.



Tuesday, January 01, 2013

बाय बाय २०१२ ..... सन २०१३चे स्वागत !



सन २०१२ ला निरोप देत असतांना हे वर्ष कशासाठी लक्षात राहील असा विचार मनात येतोच. व्यक्ती, कुटुंब, देश आणि विश्व यांच्या संदर्भात या वर्षभरात घडलेल्या मुख्य घटनांमुळेच संपलेले वर्ष आपल्या लक्षात राहते.

कुठल्याही बाबतीत लक्षणीय असे वैयक्तिक यश मिळवण्यासाठी या वर्षात मी काहीच प्रयत्न केले नाहीत, पण गेल्या तीन चार वर्षांमध्ये माझ्या ब्लॉगवर मी थोडे फार लिहीत होतो त्याची नोंद घ्यावी असे एका समीक्षकाला या वर्षात वाटले आणि त्याने माझ्या ब्लॉगची ओळख लोकसत्ता या प्रमुख दैनिकातल्या त्याच्या स्तंभात करून दिली हे माझ्या दृष्टीने लक्षात राहण्यासारखे आहे. हा स्तंभ वाचून माझा ब्लॉग वाचणा-यांच्या संख्येत भरीव अशी भर पडली नाही, तरीही एकंदर वाचनांच्या संख्येने एक लाखाचा आकडा पार केला, तसेच तो फॉलो करणा-यांची संख्या शंभरावर गेली आणि ती टिकून राहून हळूहळू वाढत आहे. व्यक्तीगत बाबतीत लक्षात येण्याजोगी गोष्ट म्हणजे मुंबईला स्थाईक झाल्यानंतर प्रथमच मी वर्षभरातला जास्त काळ मुंबईच्या बाहेर पुण्याला राहिलो.

कौटुंबिक पातळीवर पाहता आमच्या कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ आणि सर्वांना प्रिय असलेला आमचा मोठा भाऊ (प्रभाकर) या वर्षी आम्हाला सोडून गेला ही अत्यंत दुःखद घटना घडली. त्या घटनेच्या थोडेच दिवस आधी तो काहीसा अचानक पुण्याला आला होता आणि काही दिवस राहिला होता. त्या काळात आम्ही त्याला भेटून आलो आणि अनेक वर्षांनंतर त्याच्या सहवासात काही वेळ आनंदात घालवू शकलो ही त्यातल्या त्यात थोडी समाधानाची गोष्ट घडली. सन २०१२ च्या सुरुवातीला जानेवारी आणि फेब्रूवारी महिन्यात अलका बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये राहून आली होती आणि आता वर्षाच्या अखेरीलाही ती पुन्हा काही दिवस इस्पितळात राहून आताच परत आली आहे. गेल्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी माझा पुतण्या, त्याची पत्नी आणि लहान मुलगी यांच्या गाडीला मोठा अपघात झाला. दैवी कृपेने आणि आमच्या सुदैवाने त्यांना झालेल्या दुखापती त्या मानाने कमी आहेत.

मी कॉलेजमध्ये शिकत असतांना माननीय बाळासाहेब ठाकरे आणि सुपरस्टार राजेश खन्ना ही दोन नावे अचानक पुढे आली आणि त्यांनी अल्पावधीतच आपापल्या क्षेत्रात थेट शिखर गाठले. त्या काळात हे दोघेही त्या जमान्यातल्या बहुसंख्य युवकांप्रमाणेच माझेही आयडॉल झाले होते. पं.रविशंकर, संगीतकार रवी, ज्येष्ठ नट ए के हंगल आणि यश चोप्रा यांच्याबद्दल मनात आपलेपणा नसला तरी त्यांच्यामुळे मला आनंदाचे चार क्षण मिळाले होते याबद्दल कृतज्ञता आणि आदरभाव होता. या सर्वांनी जगाचा निरोप घेतला. ही सारी पिकली पाने होती तरीही त्यांच्यापैकी माननीय बाळासाहेब आणि यश चोप्रा मात्र अखेरपर्यंत कार्यरत होते, बाकीच्या लोकांचे जीवितकार्य पूर्ण होऊन ते अस्तंगत झालेले होते. पण आजच्या आवडत्या कलाकारांमधल्या आनंद परांजपे यांच्यी अपघाती निधनाचे वृत्त काळजाला चर्र करणारे होते.

गेल्या कित्येक वर्षात न घडलेली एक गोष्ट २०१२ मध्ये घडली. एका नराधमाला त्याच्या दुष्कृत्याबद्दल झालेल्या फाशीचे देशभरात सर्वांनी उत्स्फूर्तपणे जल्लोश व्यक्त करून समाधान व्यक्त केले. या वेळी प्रसारमाध्यमांनी त्या बातमीला भरपूर प्रसिध्दी दिली आणि समाजाने व्यक्त केलेल्या उन्मादाला उचलून धरले. मानवतावादाच्या नावाखाली गुन्हेगारांना पाठीशी घालणा-यांचे तुणतुणे या वेळी ऐकवले नाही. अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर येण्याच्या घटना मागील वर्षात वाढत गेल्या ही गोष्ट जनता जागृत होत असल्याचे सुचिन्ह मानता येईल, पण विशेषतः दिल्लीमध्ये त्यांना जे रूप येत चालले आहे ते थोडे काळजी वाटण्यासारखे आहे.  

आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये अमेरिका आणि रशीया या महासत्तांच्या देशात सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि अनुक्रमे ओबामा व पुतिन हे पुन्हा निवडून आले. चार वर्षांपूर्वी अमेरिकेत झालेल्या निवडणुकीच्या काळात मी अमेरिकेत होतो आणि ओबामा यांची वक्तव्ये, मुलाखती वगैरे लक्ष देऊन टीव्हीवर पहात होतो. मि.पुतिन यांनी भारताला भेट दिली असतांना ते बीएआरसीमध्ये आले होते तेंव्हा मी त्यांना दुरूनच प्रत्यक्ष पाहिले होते. यामुळे त्यांच्या फेरनिवडणुकांकडे माझे लक्ष होते. नव्याने महासत्ता झालेल्या चीनमध्ये सत्तेत बदल झाला, पण ना पहिल्या राष्ट्रप्रमुखाबद्दल मला काही माहिती होती आणि नव्या नेत्याचे नावही ऐकले नव्हते. दक्षिण कोरियात आता एक महिला प्रमुखपदावर आली आहे. एवढे सोडल्यास जगातली शांत राष्ट्रे शांत राहिली आणि अशांत राष्ट्रे धुमसतच राहिली. गेल्या वर्षभरात त्यात फारसा बदल जाणवला नाही.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोज काही ना काही नवनवे चाललेले असते पण त्याची वार्ता आपल्यापर्यंत पोचत नाही. क्युरियॉसिटी हे अमेरिकेचे यान मंगळ ग्रहावर जाऊन उतरले आणि हिग्ज बोसॉन किंवा गॉड्स पार्टिकल या मूलकणाचे रहस्य उलगडण्यात किंचित प्रगती झाली या प्रसिध्द झालेल्या मोठ्या बातम्या होत्या.

शेवटी गेल्या वर्षात मी वेगळे असे काय सुरू केले याचा विचार केल्यास
१.नियमितपणे प्राणायाम आणि काही बैठे व्यायाम करत राहिलो.
२.इंटरनेट बँकिंग समजून घेतली आणि घरी बसून निरनिराळी बिले भरली
३.फेसबुकवर वारंवार जाऊ लागलो.

तर आता सन २०१२ ला निरोप देऊन सन २०१३चे स्वागत !

हे नवीन वर्ष सर्वांना सुखसमृध्दीआयुरारोग्यदायक ठरो अशा शुभेच्छा.

एक पुस्ती  ..............................................................................
माझी ब्लॉगगिरी
मराठीत ब्लॉग लिहिणा-यातल्या पहिल्या शंभरजणांमध्ये एक मीही होतो. त्या पहिल्या शंभर अनुदिनींमधला 'आनंदघन' हा माझा ब्लॉगरवरचा ब्लॉग अजून चालत आहे आणि मी त्यावरच नवे लेखन करतो. त्याखेरीज मी वर्डप्रेसवर दोन नवीन ब्लॉग सुरू केले. मला मिळालेल्या पत्रांमधून किंवा मी आंतर्जालावर शोधून काढलेल्या माहितीमधून मला आवडलेली किंवा महत्वाची वाटलेली अशी माहिती मी 'शिंपले आणि गारगोट्या' या ब्लॉगवर देत असतो. माझ्या आनंदघन या ब्लॉगवरले काही जुने निवडक लेख पुनर्संपादन करून मी 'निवडक आनंदघन' या ब्लॉगवर चढवतो. या ठिकाणी त्यांची विषयानुसार वर्गवारी केलेली असल्यामुळे त्यांना शोधणे सोपे आहे.
हे रिकामपणाचे उद्योग जरी मी स्वांत सुखाय करत असलो तरी हे लिखाण कोणी तरी वाचावे ही इच्छा मनात असतेच. किती लोकांनी या ब्लॉगांच्या पानांवर टिचक्या मारल्या याची गणना आजकाल होते. आनंदघन लिहायला लागून सात वर्षे झाली असली तरी वाचनांची मोजदाद गेल्या २-३ वर्षांपासूनच सुरू झाली. बाकीचे ब्लॉग त्यानंतर सुरू केले. या तीन्ही ब्लॉगांना गेल्या वर्षांमध्ये आणि एकंदर किती भेटी दिल्या गेल्या हे खाली दिले आहे.
ब्लॉगचे नाव           सन २०१२     एकूण भेटसंख्या
आनंदघन               ४०६६५       ११३६२६             
शिंपले आणि गारगोट्या    ८८८५        २४१७१
निवडक आनंदघन        १२८७०        २३६३१   
या ब्लॉग्जचे पत्ते असे आहेत.
http://anandghan.blogspot.in/ .....  'आनंदघन'
http://www.anandghare.wordpress.com   ........ शिंपले आणि गारगोट्या
http://www.anandghare2.wordpress.com .......  निवडक आनंदघन

याखेरीज मी अलीकडे ब्लॉगरवर एक नवा ब्लॉग सुरू केला आहे. वैद्यकीय माहिती, समजुती, गैरसमजुती, वावड्या, प्रचार वगैरे सगळ्या प्रकारचा जो मजकूर आपल्यावर येऊन आदळत असतो तो बहुधा इंग्रजी भाषेत असतो. तो या ठिकाणी वाचायला मिळेल.
http://abghare.blogspot.in/ ...........  Good Klostrol Bad Choklet